व्हर्लपूल

कथा * माधव गवाणकर

बकाल वस्तीतला मी एक कंगाल कवी होतो. शे पन्नास रुपये मिळाले तरी त्यासाठी रेडिओ केंद्रापर्यंत रेकॉर्डिंगसाठी जायचो. स्वत:चा दिवाळी अंक काढून पुरता फसलो होतो. कर्जात बुडालो होतो. मनात ‘नकारात्मक’ विचार खूपदा यायचे. समुद्र त्यादृष्टीने जवळ होता. मला पोहता येत नव्हतंच. पूर्णवेळ लेखनाच्या उचापती अंगाशी आल्या होत्या. बेरोजगारी घामोळ्यासारखी टोचतदाह करत होती.

विजेची दोन महिन्यांची बिलं भरायची बाकी होती. गॅस बाकबुक करत होता. त्याचा जीव कधीही गेला असता. माझं जेवण मीच करायचो, पण गॅस तर पाहिजे. तरी बरं संसाराचं ओझं नव्हतं. मरून गेलो तरी माझा मीच होतो. मी आरशात स्वत:ला पाहिले. अगदी लाचार, ओशाळवापणा फिकट वाटत होतो मी. कुणालाही माझा उपयोग नाही आणि या पैशाच्या तालावर नाचणाऱ्या महानगरात जगण्याची आपली पात्रता नाही याची खात्री पटू लागली होती.

क्लासमेट हेमू माझ्या गरिबीचा वास काढत नेमका येऊन थडकला. मऊ स्वरात त्याने चौकशी केली. त्याचे शब्द धीर देऊ लागले. खानदानी, वडिलोपार्जित संपत्तीचं काय करायचं चैन तरी करून किती करणार? असा हेमूसमोर सवाल असायचा. मी रोज रेडिओवर कार्यक्रम केला असता, तरी हेमूच्या गळ्यात जी सोन्याची जाडजूड जड चेन होती, तशी मला घेता आली नसती. हेमू समलैंगिक आहे आणि महिलांऐवजी पुरुषांकडे अधिक आकर्षित होत असल्याने मला त्याची थोडी भीतिच वाटायची. पण मी बेकारीमुळे अगदी फाटकातुटका झालोय हे हेरून तो माझ्या त्या पावसात गळणाऱ्या रुमवर येऊ लागला होता. त्याची कार माझ्या रंग जाऊन भंग झालेल्या घरापाशी अजिबात शोभत नसे.

‘‘असा का दिसतो आहेस तू? आजारी वाटतोयस…. चणचण आहे का पैशाची?’’ हेमूने अचूक ठिकाणी बोट ठेवलं.

‘आहे खरी, पण…’’

‘‘असे कितीसे लागतील?’’ या प्रश्नात त्याला असं सुचवायचं असावं की एक कवी मागून किती मागणार? मोठी रक्कम मागण्याचं तुला धैर्यच होणार नाही.’’

‘‘सध्या हजार रुपये पुरतील. नोकरी लागल्यावर शे दोनशे करत फेडेन मी सगळे…’’ मी इमानदारीत बोललो. बांगड्या किणकिणतात तसा तो हसला.

मधाच्या पोळ्याकडे अस्वलाने बघावं तशी गढूळ नजर लावत मग त्याने इरादा सांगितला. ‘‘परत कसले करतोस! हे घे, राहू दे तुलाच. आता फक्त एक गोष्ट माझ्यासाठी करायची… थोडा वेळ… से, हाफ अॅन अवर… मलाच तुझी बायको समजायचं.’ तू तरुण पुरुष आहेस आणि तेवढं मला पुरेसं आहे…’’ माझ्या छातीची धडधड वाढली. पैसे ही माझी तातडीची निकड होती, पण ‘कृत्य’ करायला मन धजावत नव्हतं. कच खात होतं. तशी सवय नव्हती.

तेवढ्यात हेमूने किंचित कडक स्वरात म्हटलं, ‘‘तुम्ही मिडलक्लासवाले नुसताच विचार करत बसता. सोडून दे ही वृत्ती. ये, असा जवळ…’’ नंतर मला काही बोलू न देता, त्याने जवळीक साधली. त्या प्रसंगाचं वर्णन कशाला करायचं. ते काही प्रेम नव्हतं! ती मजबुरी होती. हेमूला जे साधायचं होतं, ते त्याने साधलं.

पैसे तर त्याने रोख दिलेच होते. तो निघूनही गेला.

नंतर मात्र मला रडू कोसळलं. आईवडिलांचा मृत्यू आधीच झालेला होता. माझं सख्ख असं कोणी शिल्लक नव्हतं. आपण जणू फुटपाथवर झोपतो आणि कुणीही आपल्याला वापरू शकतं असा फील मला आला. परिस्थितीचा भोवरा माणसाला काय करायला भाग पाडतो ते माझं मलाच कळून चुकलं. हा ‘व्हर्लपूल’ फार भयानक असतो. स्नान केल्यावरही मला स्वच्छ वाटेना. नंतर मला अर्धवेळ का होईना, नोकरी मिळाली. तंगी कमी झाली, पण आपल्या विषमतेने पोखरलेल्या या देशात धनदांडगी माणसं सहजपणे आमचं पौरुषत्व लुटू शकतात आणि आमच्यावर केवळ पोट जाळण्यासाठी तेही करणं भाग पडतं असाच शिक्का यातून बसतो. कुणी म्हणेल शिक्का, कुणी म्हणेल डाग. मात्र कलंक असं म्हणताना, गरीब माणसाची हतबलताही लक्षात घेतली पाहिजे… घेतलीच पाहिजे!

वाग्दत्त वधू

* वीना श्रीवास्तव

समोरच्या त्या बंगल्याची साफसफाई अन् रंगरंगोटी सुरू होती. चारी बाजूंनी उगवलेलं गवत व झाडंझुडपं यामुळे तो बंगला भयाण वाटायचा. कितीवर्षापासून एक गंजलेलं कुलुप मुख्य दरवाजावर दिसायचं. आज जी बंगल्याचं तेज आणि वैभव झाकोळलेलं असलं तरी कोणे एके काळी तो बंगला नक्कीच फार सुंदर असावा. ऊन, पाऊस, वादळ, वारा सोसून बंगल्याच्या भिंती काळपटल्या होत्या. खिडकी दरवाजांची कळा गेली होती. पण भक्कम कडी कोयंड्यांच्या आधारे अजूनही दारं खिडक्या जागेवर होती.

कोण येणार आहे इथं रहायला? तनीषाची उत्सुकता चाळवली गेली होती. कुणी विकत घेतलाय का बंगला? इतका भव्य बंगला विकत घेणारा कुणी पैसेवालाच असणार. पण हल्ली तर लोकांना अर्पाटमेंट अन् फ्लॅटमध्येच रहायला आवडतंय. मग ही कोण वल्ली असणार जी या जुन्या वाड्याला नटवून सजवून इथं मुक्कामाला येणार आहे?

मनांत उत्सुकता हिंदोळत असतानांच एक तरूण तिच्याच घराकडे येताना दिसला. त्यालाच विचारावं का कोण येतंय इथं रहायला? पण नको, असेल कोणी चक्रम किंवा पुरातत्त्ववेत्ता जो इथं येऊ घातलाय, खरं तर या बंगल्याला काही ऐतिहासिक किंवा पौराणिक महत्त्व नाहीए, एवढं तिला ठाऊक होतं. पण कुणाला काय आवडेल हे आपण कसं ठरवणार?

‘‘माफ करा,’’ तो तरूण तिच्या गेटाशी उभा होता.

तिनं दचकून बघितलं…तो तिच्याशीच बोलला का? तिनं इकडं तिकडं बघितलं.

‘‘हॅलो, मावशी, मी तुमच्याशीच बोलतोय.’’ त्यानं म्हटलं. आपल्यासाठी त्यानं मावशी संबोधन वापरावं हे तिला जरा खटकलं. मी खरंच इतकी वयस्कर दिसते का? वय पन्नाशीला आलंय हे खरं असलं तरी दिसते तर अजून पन्नाशीचीच. बांधाही अटकर आहे. कुठं तरी केसात एखादा चंदेरी तार दिसतो पण बाकी केस काळेभोरच आहेत.

तिला थोडं विचित्र वाटलं पण ती गेटाकडे गेली. तो तरूण दिसायला देखणा अन् शालीन दिसत होता. ‘‘माझं नाव अनुज पंडित आहे. मला पाणी मिळेल का? आता घरात काम सुरू केलंय. पाण्याची लाइन आज सायंकाळपर्यंत सुरू होईल. पण आत्ताच्या गरजेचं काय?’’

‘‘बरोबर आहे. ये, आत ये. पाणी मिळेल.’’ तिनं माळ्याला हाक मारून सांगितलं, ‘‘नळाला पाईप लावून समोरच्या बंगल्यात पाणी जाऊ दे. त्यांचं काम होई तो नळ बंद करू नकोस.’’

‘‘ये रे, आत ये. मी चहा करते. भूकही लागली असेल ना?’’

चहा फराळ करता करता अनुजनं त्याच्या कुटुंबाची माहिती सांगितली. तो बंगला अविनाश पंडितांचा वडिलोपार्जित वारसा होता. अविनाशचे वडील अभय पंडित खूप वर्षांपूर्वी धंद्याच्या निमित्तानं नैरोबीला गेले अन् तिथंच स्थायिक झाले. अविनाशचं सगळं आयुष्य तिथंच गेलं. त्यांनीही धंदा छान वाढवला. त्यांची मुलंही तिथंच मोठी झाली. पण आता त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न, अनुजच्या बहिणीचं लग्न भारतातून करायचं आहे तेही आपल्या वडिलोपार्जित बंगल्यातून. म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय.

‘‘लग्नं कधी आहे?’’

‘‘पुढल्या महिन्यांत, २५ तारखेला. आता वेळ तसा कमी उरलाय त्यामुळे खूप घाई करावी लागतेय. तेवढ्यासाठी मला बाबांनी भारतात पाठवलंय.’’ चहाफराळ आटोपून तो निघून गेला. जाताना तीनतीनदा आभार मानले. तनु लगेच आरशासमोर जाऊन उभी राहिली. त्यानं मला मावशी का म्हटलं? तिनं निरखून स्वत:कडे बघितलं. अजूनही ती सुंदरच दिसंत होती

तनीषा एकटीच राहते. ती अविवाहित आहे, कॉलेजात प्रोफेसर आहे अन् एकटीच राहते हे आजूबाजूच्या सर्वांना ठाऊक आहे. तिचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. कुणी तरी कधी खासगीत तिच्या लग्न न करण्याबद्दल बोलतो पण कारण कुणालाच ठाऊक नाहीए. तनीषाला मात्र ती अजूनही कुमारी का आहे हे पूर्णपणे माहीत आहे. यात दोष कुणाचा होता? तिचा? नियतिचा, तिच्या घरच्यांचा? तिचाच? वेळेवारी तिच लग्नं झालं असतं तर आजा अनुजएवढा मुलगा असताच ना तिचाही? तिनं एक दीर्घ श्वास घेतला. ती स्वत:शी पुटपुटली, ‘‘प्रसन्न, कुठे आहेस रे? तुला माझी आठवण येते की पूर्णपणे विसरलास मला?’’ स्वत:शीच बोलताना ती तिच्या तारूण्यात शिरली.

‘‘तनु, आज क्लासनंतर भेटूयात.’’ प्रसन्ननं तिला म्हटलं. तिच्या तनीषा नावाचं लघुरूप तनु त्यानंच केलं होतं.

‘‘अरे, पण आज माझं प्रॅक्टिकल आहे. तेही शेवटच्या तासाला…त्यानंतर लगेच मला घरी जावं लागेल तुला ठाऊक आहे, थोडा ही उशीर झाला तरी आई खूप रागावते.’’

प्रसन्नला तिच्या भावनांची जाणीव होती. तरीही निघता निघता तो म्हणाला, ‘‘ठीक आहे, तरीही, मी तुझी वाट बघेन.’’

‘‘बघते,’’ हसून तनीषा म्हणाली.

तनीषा एम.ए, करत होती. प्रसन्न तिचा सीनियर होता. तो पीएचडी करत होता. तिला अभ्यासात मदतही करायचा. तो विलक्षण हुषार होता. प्रोफेसर नाही आले तर तो क्लासही घ्यायचा. प्रिंसिपनीच त्याला तसं सांगितलं होतं.

त्याची शिकवण्याची, समजवण्याची पद्धत फारच छान आणि आकर्षक होती. तनुला ते फार आवडायचं. प्रसन्नलाही तनीषा विषयी ओढ वाटायची. तिचं सौंदर्य त्याला भुरळ घालायचं. कॉलेजमध्ये त्यांच्याबद्दल चर्चाही चालायची.

ही चर्चा तनीषाच्या घरापर्यंतही पोहोचली. आईबाबांच्या कानावर काही ती आलं असावं. ते विचारू लागले.

‘‘तनीषा, खरं काय ते सांग, हा प्रसन्न कोण आहे? शुभ्रा त्याच्या नांवानं तुला चिडवंत होती, ते का?’’

‘‘काही नाही गं आई. माझा सीनियर आहे. मला प्रॅक्टिकल्समध्ये अभ्यासात वगैरे मदत करतो. बाकी काही नाही. शुभ्राला तो भाव देत नाही म्हणून ती मला चिडवते.’’ तनीषानं सांगितलं.

‘‘एवढंच ना? मग ठीक आहे. पण अजून काही असलं तर मात्र मला विचार करावा लागेल हं!’’ आईनं तंबीच दिली.

‘‘आईनं असं का बरं म्हटलं? प्रसन्न खरंच माझ्या आयुष्यात इतका महत्त्वाचा आहे का?’’ तिनं स्वत:लाच प्रश्न केला.

‘‘इतका?’’ दुसरं मन उत्तरलं ‘‘तो तुझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचा आहे. जरा आरशात चेहरा बघ, त्याला बघताच कशी लाललाल होतेस तू? मनांतून तू सतत त्याची वाट बघत असतेस ना? तोही सतत तुझ्या मागावर असतो ना? मग? हे प्रेमच आहे गं बाई!!’’

म्हणजे आता शंकेला वाव नव्हता. एक दिवस ती लायब्ररीत अभ्यास करत असताना अवचित प्रसन्न येऊन थडकला.

‘‘अरे? तू इथं का आलास? काही खास बोलायचं आहे का?’’ तिनं विचारलं.

‘‘होय, खासच बोलायचंय. मला सांग. तुझ्या आयुष्यातस माझी जागा काय आहे?’’ प्रसन्नच्या आवाजात उतावळेपणा होता.

‘‘असं का विचारतो आहेस? माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे हे वेगळ्यानं सांगायला हवं का? तुझ्या विना माझं अस्तित्त्वच नाहीए रे. प्रसन्न आहे तर तनीषा आहे. झाडाला बिलगलेल्या वेलीला सांगावं लागतं का की तिच्या जीवनात त्या झाडाचं काय महत्त्व आहे ते?’’ तनीषा बोलून गेली अन् मग जीभ चावून गप्प बसली. मनांतच म्हणाली, ‘‘देवा रे, मी काय बोलून गेले…प्रसन्नला काय वाटेल? मी कित निर्लज्ज आहे असं वाटेल ना त्याला?’’

‘‘बोल बोल, तनु, गप्प का झालीस? शेवटी खरं काय ते तुझ्या तोंडून निघालं. मला वाटंत होतं पण खात्री नव्हती. तुझ्या तोंडून ऐकलं अन् खात्री पटली.’’ त्यानं क्षणांत तिला मिठीत घेतलं अन् तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तनीषानं स्वत:ला सोडवून घेतलं अन् तिथून धूम ठोकली. लाजेनं लालेलाल झाली होती ती.

आता तर सगळे उघडच म्हणायचे यांची जोडी फारच छान आहे. जणू एकमेकांसाठीच आहेत दोघं. त्यांचं प्रेम आईवडिलांनाही जाणवलं होतं. त्यांचं लग्न करून द्यावं असं वाटत होतं. प्रसन्नलाही पुण्यात लेक्चरर शिप मिळाली होती. दोन्ही घरातून होकार होता. दोघंही आनंदात होती पण प्रसन्नच्या आजीनं दोघांची पत्रिका जुळवण्याची टूम काढली अन् दुर्दैवानं तनीषाला मंगळ निघाला.

तनीषाच्या आईवडिलांचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यांनी कधी पत्रिका वगैरे केलीच नव्हती. त्यांना या सगळ्या अंधश्रद्धा वाटत होत्या पण प्रसन्नची आजी मात्र हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम होती. प्रसन्न तिचा एकुलता एक नातू अन् घराण्याचा वारस होता. खरं तर तो शिकलेला होता. त्याला तनीषाखेरीज इतर कुणाही मुलीशी लग्न करायचं नव्हतं. तो ही अडून बसला की तनीषा खेरीज तो कुणाशीही लग्न करणार नाही.

तनीषाला ही गोष्ट कळली तेव्हा तिनंच हे लग्न मोडण्याचं ठरवलं. ‘‘हे बघ प्रसन्न, जर आपल्या लग्नांमुळे तुझ्या जिवाला धोका संभवंत असेल तर मी तुला या बंधनातून मुक्त करते. मला तुझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढायचं आहे. फक्त तुला मिळवणं किंवा त्यासाठी लग्न करणं याला काय अर्थ आहे? तुला काही झालं तर मी स्वत:ला क्षमा करू शकणार नाही…’’ तनीषानं म्हटलं.

प्रसन्नला धक्काच बसला. आश्चर्यानं त्यानं विचारलं, ‘‘आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतोय तर या असल्या गोष्टींवर आपण विश्वास का ठेवायचा? कुठल्या तरी काल्पनिक भयानं तू पाऊल मागे का घेते आहेस? तुझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही का? बी लॉजिकल.’’

तनीषा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. तिनं प्रसन्नच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण प्रसन्ननं आपल्या नावांची हिऱ्याची अंगठी तिच्या डाव्या हाताच्या तर्जीत घातली अन् तो म्हणाला, ‘‘ही अंगठी आपल्या साखरपुड्याचं प्रतीक आहे. मी तुझ्या होकाराची वाट बघेन.’’ अन् मागे वळून बघता तो तिथून निघून गेला.

लवकरच तो नव्या नोकरीत रूजू झाला. तनीषानं त्याला भेटणं कमी केलंच होतं, आता फोनवरचा संपर्कही कमी केला. प्रसन्नला भेटल्यावर कदाचित आपला निश्चय बारगळेल अशी तिला भीती वाटत होती. प्रसन्न मात्र तिची वाट बघत होता. तनीषालाही कॉलेजात नोकरी मिळाली. तिनं स्वत:ला कॉलेजच्या इतर व्यापात गुंतवून घेतलं.

प्रसन्नला कॅनडाची एक फेलोशिप मिळाली. तो दोन वर्षांसाठी तिकडे गेला अन् मग तिथलीच एकेक कामं मिळत गेली म्हणून त्याचा कॅनडामधला मुक्काम वाढतच गेला. कधीतरी फोन, कधी तरी व्हॉट्सअॅपवर बोलणं व्हायचं, ते ही कमी कमी होत गेलं अन् एक दिवस शुभ्रानं तिला त्याच्या लग्नाची बातमी दिली.

ज्या आजीमुळे प्रसन्न तनीषाचं लग्न मोडलं होतं ती मृत्युशय्येवर होती अन् तिला प्रसन्नला वरवेषात बघायचं होतं. नातसून बघायची होती. शेवटी तिच्या इच्छापूर्तीसाठी प्रसन्ननं लग्नं केलं होतं. हे ऐकून मात्र तनीषाचे डोळे भरून आले. प्रसन्ननं तिच्या बोटात घातलेल्या अंगठीमुळे ती स्वत:ला त्याची वाग्दत्त वधू समजत होती. प्रसन्न तर आजीची इच्छा धुडकावून तिच्याशी लग्न करायला तयार होता. तिनंच नकार दिला. आता रडून काय होणार? पण तिला तेही मान्य होईना?

‘‘नाही, मी त्याची अन् तो माझा आहे. त्याचं लग्न कुणा बरोबरही झालं तरी माझ्या बोटातली अंगठी त्याच्या प्रेमाची खूण आहे.’’ तिनं स्वत:लाच समजावलं यापुढे ती एकटीच जगणार होती.

तिचा निश्चय ऐकून आई वडिलांनी तिच्या भावाचं लग्न करून दिलं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती भावासोबत राहत होती. पण वहिनीला हळूहळू तिचं राहणं खटकू लागलं. ती वेडवाकडं बोलायची, टोमणे मारायची. तनीषा आजारी पडली तव्हा वहिनीला तिची सेवा करावी लागली तेही ती बोलून दाखवायची पण वहिनीची तिन्ही बाळंतपण तनीषानं निस्तरली होती, तिचे माहेरचे फिरकलेही नव्हते, हेही सोयीस्करपणे विसरली होती. वहिनीला निवांत रात्रीची झोप मिळावी म्हणून ती मुलांना आपल्याजवळ झोपवंत होती. सकाळी सगळा स्वयंपाक आटोपून कॉलेजला जायची. आल्यावरही सतत बाळाच्या व बाळंतिणीच्या तैनातीत असायची. पगारातली ठराविक रक्कम वहिनीच्या हातात दिल्यावरंच ती आपला खर्च करायची.

शेवटी भावानं वेगळा फ्लॅट घेतला. बहीण एकटी पडेल याची काळजी त्याला वाटली नाही. आता तर ती अगदी एकटी होती.

दाराची घंटी वाजली तशी ती भानावर आली. दार उघडलं तर दारात अनुज होता. बहिणीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका द्यायला आला होता. तिनं पत्रिका बघितली. नीरजा+प्रतीक अशी नावं वाचली. वराच्या वडिलांचं नांव प्रसन्न दीक्षित बघून तिच्या तोंडून आश्चर्य आनंदाचा चित्कार बाहेर पडला…हा प्रतीक म्हणजे माझ्या प्रसन्नचा मुलगा आहे का? नसेलही…हा दुसराच कुणी प्रसन्न दीक्षित असू शकतो…तिनं स्वत:लाच समजावलं.

‘‘मावशी, लग्नाला नक्की या हं!’’ तीन तीनदा बजावून अनुज निघून गेला.

आज ती खूप वेळ स्वत:लाच आरशात निरखंत होती. खरंच ती म्हातारी झाली होती? शक्यता आहे. परिस्थितीशी झुंज घेताना दमछाक होतेच. काळचक्र मागे फिरवता आलं असतं तर तिनं प्रसन्नला घट्ट मिठी मारली असती.

‘‘ये रे प्रसन्न, तुझा तनू आजही तुझी वाट बघतेय.’’ एक नि:श्वास तिच्या तोंडून बाहेर पडला.

आज पंचवीस तारीख. सायंकाळी नीरजाची वरात येणार आहे. जाऊ की नको जाऊ, या मानसिक द्वंदात तिनं काहीच तयारी केली नव्हती. वधूसाठी काही भेट वस्तू ही घेतली नव्हती. वेळेवर पाकिटात घालून कॅश देता येईल असं तिनं ठरवलं.

बँडच्या आवाजानं ती पुन्हा भानावर आली. वरात आली वाटतं. तिनं पटकन आवरलं. केसांचा सुंदर अंबाडा घातला. निळ्या रंगाची सिल्कची साडी, त्यावर मोत्याचे दागिने, बोटात प्रसन्ननं दिलेली अंगठी होतीच. प्रसन्नचं प्रेम होतं ते.

सगळा बंगलाही नववधूसारखा नटला होता.

वरात दारात आली होती. तिची नजर नवरदेवाच्या वडिलांकडे गेली. प्रसन्नच होता. आपल्या व्याह्यांनी केलेल्या विनोदावर खूप खूप हसंत होता. तनीषाची नजर तिच्या प्रसन्नला शोधंत होती, तो कुठंतरी हरवला  होता. डोक्यावरचे अर्धे पांढरे, अर्धे काळसर केस, कल्ल्यांजवळ पांढरे झालेले केस त्याचं वय सांगत होते. थोडं सुटलेलं पोट सुखसमृद्धीचं प्रतीक होतं…छे! हा माझा  प्रसन्न नाहीए. तिनं स्वत:लाच समजावलं. तेवढ्यात मैत्रिणीच्या घोळक्यातली सुंदर नटलेली नववधू हातात वरमाळा घेऊन येताना दिसली. तनिषानं झटक्यात निर्णय घेतला अन् पुढे होऊन नीरजाच्या बोटात आपली अंगठी घातली. नीरजाला काही कळायच्या आत ती तिथून निघाली. आता तिचं तिथं काहीच काम नव्हतं.

जेव्हा प्रसन्न सुनेच्या बोटात ती अंगठी बघेल तेव्हा त्याला माझी आठवण येईल का? या विचारातच तिला गाढ झोप लागली. आता प्रसन्न कधीच परत येणार नव्हता. आता तिला कुणाविषयी कसलीच तक्रार नव्हती. तिचं मन शांत शांत झालं होतं.

कोडं

कथा * रश्मि शर्मा

शनिवारी सायंकाळीच मी ऑफिसातून थेट माझ्या माहेरच्या घरी एका रात्रीच्या मुक्कामासाठी आले. सीमाताई अन् भावजी पण दोन दिवसांसाठी आले होते. म्हटलं चला, तेवढीच आई आणि ताईसोबत गप्पा गोष्टी करण्यातली मजा अनुभवता येईल. पण मी पोहोचतेय तिथं, तोवरच रवीचा, माझ्या नवऱ्याचा फोन आला.

मी त्यावेळी वॉशरूममध्ये होते म्हणून फोन आईनंच घेतला.

मी आरामात सोफ्यावर येऊन बसले. चहाचे कप सखूबाईंनी सर्वांच्या हातात दिले अन् मग आई जरा रागानं म्हणाली, ‘‘रवीचा फोन होता. तुझ्या सासूला ताप आलाय म्हणून सांगत होता.’’

मी एकदम तडकलेच. ‘‘इथं येऊन अजून तासभरही झाला नाहीए अन् लगेच बोलावून घेताएत. सासूबाईंना तर माझं एक दिवसाचं स्वातंत्र्यही बघवंत नाही. तापच चढतो त्यांना.’’

‘‘कुणास ठाऊक, खरंच ताप आलाय की उगीचच तुला बोलावून घेण्यासाठी नाटक करताहेत.’’ ताईनं शंका बोलून दाखवली.

‘‘आज सकाळी जेव्हा मी त्यांच्याकडे एक रात्र इथं राहण्याची परवानगी मागितली, तेव्हाच त्यांचा चेहरा बदलला होता, फुगल्याच होत्या…ताई, तुझी मजा आहे बाई! एकटी राहतेस, सासूसासऱ्यांचा काच नाहीए तुला.’’ माझा मूड फारच बिघडला होता.

‘‘तुला या काचातून सुटायचं असेल तर तू तुझ्या सासूला तुझ्या थोरल्या जावेकडे राहायला पाठव ना? हटूनच बैस. सत्याग्रह कर.’’ ताईनं मला सल्ला दिला. माझ्या लग्नानंतर एक महिन्यानंतर आम्ही भेटलो तेव्हा ही तिनं मला हेच सांगितलं होतं.

‘‘माझी मोठी जाऊ महा कजाग अन् जहांबाज आहे. तिच्याकडे जायला सासूबाई राजी नाहीत अन् तिकडं त्यांना पाठवायला त्यांचा धाकटा लेक तयार नाही. तुला ठाऊक आहे का, मागच्या महिन्यात मी सासूबाईंना जावेकडे पाठवण्याचा हट्ट धरला तर यांनी मला चक्क घटस्फोटाची धमकी दिली. ताई, अगं, यांना आईपुढे माझी काहीही व्हॅल्यू नाहीए.’’

‘‘तू त्याच्या घटस्फोटाच्या धमकीला घाबरू नकोस. कारण रवीचं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे तर आम्हाला सर्वांनाच कळंतय, दिसतंय, जाणवतंय. तुझी व्हॅल्यू तर आहेच!’

‘‘सीमा, खरं बोलतेय शिखा, तू फक्त प्रेमानं त्याला वळव. तुझ्या सासूला दोन्ही सुनांकडेल बरोबरीनंच राहायला हवं. अगदी एका सुनेकडेच सारखं राहायचं म्हणजे काय?’’ आईनं ताईच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

मी एक नि:श्वास सोडला. चहाचा कप टीपॉटवर ठेवत मी म्हटलं, ‘‘आई, आता तर मला निघायलाच हवंय!’’

‘‘वेड्यासारखं नको करूस,’’ आई भडकलीच! ‘‘अगं, इतक्या दिवसांनी येते आहेस, रात्रभर राहून जा. तेवढीच विश्रांती!’’

‘‘आई, माझ्या नशिबात विश्रांती नाही. मला परत गेलंच पाहिजे.’’ मी आपली पर्स उचलली.

‘‘शिखा, अगं तू इतकी का घाबरतेस? रवीनं आईला एकदाही, शिखाला परत पाठवा, असं म्हटलं नव्हतं,’’ ताई मला अडवंत, मला समजावंत म्हणाली.

‘‘नको ताई, मी गेले नाही तर यांचा मूड फारच बिघडेल. तुला माहीत आहे ना, किती संतापी आहेत ते?’’

बाबाही बिचारे मला थांब म्हणंत होते. पण कुणाच्या समजावण्याचा काहीही उपयोग नव्हता. तासाभरातच भावजींनी गाडी काढली अन् ताई व ते मला सोडायला घरापर्यंत आले. पण त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी ते घरात आले नाहीत.

मला अचानक आलेली बघून रवी दचकले, ‘‘अगं? तू परत का आलीस? मी तुला बोलावण्यासाठी फोन केला नव्हता…’’ ते म्हणाले पण त्यांच्या डोळ्यातली आनंदाची चमक लपवता आली नाही. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तक्रारीच्या सुरात म्हटलं, ‘‘एक रात्रही आईबाबांकड राहू दिलं नाहीत तुम्ही…एक रात्र तुम्ही तुमच्या आईला सांभाळू शकत नव्हता का?’’

‘‘परत बोलवायचं नव्हतं, तर मग फोन केलातंच का?’’

‘‘स्वीटहार्ट, फोन फक्त तुला सूचना देण्यासाठी केला होता.’’

‘‘ही सूचना उद्या सकाळी दिली असती तरी चाललं असतं ना?’’ मी चिडूनच विचारलं. त्यावर त्यांना काही उत्तर देता आलं नाही.

त्यांना तिथंच सोडून मी माझा मोर्चा सासूबाईंच्या खोलीकडे वळवला.

त्यांच्या खोलीत शिरताच मी एका श्वासात, वरच्या सुरात त्यांना ढीगभर प्रश्न विचारले, ‘‘आई, तुम्हाला एवढा तेवढा ताप आला तर इतकं घाबरून का जाता तुम्ही? समजा आला ताप तर एक रात्र तुमचा लाडका लेक सेवा करू शकत नाही का? मला फोन करून बोलावून घ्यायची काय गरज होती? एक रात्र मी माझ्या माहेरी राहू शकत नाही का?’’

‘‘हे बघ, मी चक्कार शब्दांनं रवीला तुला बोलावून घे असं म्हटलं नव्हतं. या बाबतीत माझ्यावर ओरडायचं नाही. समजलं ना?’’ सासूबाईही आघाडी सांभाळून होत्या.

‘‘यांच्यासाठी आईनं डबा दिलाय. तुम्ही काय खाल?  सकाळी मी मुगाचं वरण…’’

‘‘मला काही वरण फिरण खायची इच्छा नाहीए.’’ त्या रागातच होत्या.

‘‘मग हॉटेलातून छोले भटूरे किंवा वडापाव मागवून देऊ?’’

‘‘सूनबाई, तू उगीच माझं डोकं फिरवू नकोस.’’

‘‘हो ना, डोकं माझंच फिरलंय…तुमच्या आजारपणाबद्दल ऐकून तशीच धावत आले…ज्या बाईपाशी इतक्या जोरानं बोलायची आणि भांडायची एनर्जी आहे, ती आजारी कशी असेल?’’

बोलता बोलता मी त्यांच्या कपाळावर माझा तळवा टेकवला अन् मी दचकले. त्यांना सणसणूनताप भरला होता.

‘‘तू अजून माझा संताप वाढवायला आली आहेस का? सांगून ठेवते, माझ्यावर उपकार केल्याचा आव आणू नकोस.’’

त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी, मघाशीच खोलीत आलेल्या रवींना म्हटलं, ‘‘तुम्ही उभ्या उभ्या बघताय काय? आईंच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवता येत नाहीत का? केवढा ताप आहे त्यांच्या अंगात…’’

रवी एकदम गडबडले, ‘‘ठेवतो…ठेवतो गार पाण्याच्या घड्या…’’ म्हणत ते स्वयंपाक घराकडे धावले.

‘‘मी तुमच्यासाठी छानशी मुगाची खिचडी करते. चव येईल तोंडाला.’’

‘‘मी काहीही खाणार नाही. माझ्यासाठी एवढे कष्ट घेण्याची गरजही नाहीए.’’ त्या अजून रागातच होत्या.

‘‘सूनबाई, कान उघडून नीट ऐकून घे. हे घर माझं आहे…आणि मी इथंच राहणार. तुझ्यानं होत नसतील माझी कामं तर नको करूस…’’ सासूबाई ठसक्यात म्हणाल्या.

‘‘उगीच नको ते बडबडण्यापेक्षा चहा घ्याल का ते सांगा. उगीच माझं डोकं उठवू नका.’’ मी कपाळावर हात मारून बोलले.

‘‘तू माझ्याशी नीट का बोलत नाहीस सूनबाई?’’ आता त्यांनी अगदी शांतपणे विचारलं.

‘‘काय चुकीचं बोलले मी?’’

‘‘तू चहाचं विचारतेस की काठीनं हाणते आहेस?’’

मला हसायला आलं. ‘‘तुम्ही ना जन्मभर माझ्या तक्रारीच करत राहणार,’’ मी हसून स्वयंपाक घराकडे वळले.

स्वयंपाक घरात मी एकीकडे चहाचं आधण ठेवलं. दुसरीकडे मुगाची डाळ, तांदूळ धुवून ठेवले. तेवढ्यात रवीनं पटकन् मला मिठीत घेतलं. भावनाविवश होऊन म्हणाले, ‘‘बरं झालं तू लगेच आलीस. आईचा ताप बघून मी खूप घाबरलो होतो. खरं तर एक रात्रही तुला माहेरी राहू दिलं नाही याबद्दल खूप खूप सॉरी…’’

‘‘मोठे आलात सॉरी म्हणणारे…माझी काळजी कधी करता तुम्ही?’’ मी पटकन् त्यांच्या ओठांवर माझे ओठ ठेवून त्यांचं तोंड बंद केलं.

माझं चुंबन घेत ते म्हणाले ‘‘तू मनाची खूप स्वच्छ आणि प्रेमळ आहेस. तोंडानं मात्र जहर कडू बोलतेस.’’

‘‘सगळं कळतंय मला. तुमच्या आजारी आईची मी सेवा करावी म्हणून माझी खोटी प्रशंसा करताय? काही गरज नाहीए त्याची.’’

‘‘नाही गं! खरंच तू मनाची फार चांगली आहेस.’’

‘‘खरंच?’’

‘‘तर मग प्रयत्न तरी का करताय? जा, आपल्या आईजवळ जाऊन बसा.’’ मी हसत हसत त्यांना स्वयंपाक घराच्या बाहेर ढकळलं.

ते खरं म्हणाले. महिन्याभरापासून माझ्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे मी म्हणजे सासूबाई अन् नवरा दोघांसाठीही एक कोडंच ठरले होते.

सासूबाईंबरोबर आजही मी बोलते तिखटंच. पण त्यांची सर्व कामं मी मनापासून अन् त्यांच्या सोयीनुसार करते. त्यामुळे त्यांची खूप सोय होते अन् समाधानही होतं.

गंमत म्हणजे मी बदलल्यामुळे माझ्या सासूबाईदेखील बदलल्या आहेत. आता त्या त्यांची सुखदु:खं मोकळेपणाने माझ्याशी बोलतात. पूर्वी आमच्यात एक वरवरची आणि खोटी शांतता असायची. पण आता आम्ही एकमेकींशी कडकडून भांडलो तरी मनातून एकमेकींवर प्रेम करतो, एकमेकींची काळजी घेतो अन् खरोखरंच आनंदात असतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमच्या भांडणांमुळे रवींना टेन्शन येत नाही. त्यांचं बी.पी एकदम नॉर्मल असतं. खरं सांगायचं तर नवऱ्याची तब्येत उत्तम राहावी अन् संसार सुखानं चालावा यासाठी मी स्वत:ला बदललं आहे.

‘‘माझ्या आणि सासूबाईंच्या भांडणात मध्ये पडलात तर बघा.’’ मी यांना महिन्यापूर्वीच धमकी दिली होती. आता आमची भांडणं बघत ते स्वत:शीच हसंत असतात.

‘‘बाइलवेडा आहेस, बायकोचा गुलाम, कधी तरी आईची कड घेऊन बोलत जा,’’ सासूबाई मुद्दाम यांना चिडवतात तेव्हा ते अगदी मोकळेपणांनं हसतात.

सासूसासऱ्यांपासून दूर दूर राहणाऱ्या सीमा ताईच्या आयुष्याशी माझ्या आयुष्याशी तुलना करताना पुन्हा माझ्या मनांत थोडे निगेटिव्ह विचार येताहेत. पण सासूबाई बऱ्या झाल्या की मी त्यांच्याशी एकदा कडकडून भांडून घेईन म्हणजे माझं मन मोकळं होईल. त्यांनाही बरं वाटेल. टेन्शन संपलं की आनंदी आनंद.

मारा गया बेचारा !

कथा * माधव गवाणकर

निखिल ड्रयव्हर असला तरी स्मार्टबॉय होता. आधी ‘हेवी’ वाहन चालवत होता, पण गावाकडून शहराकडे जाताना घाटरस्ते लागायचे. जागरण घडायचं. बॉडी उतरू लागली. मग बिपीनकडे ते काम सोपवून तो रीनाकडे नोकरीला लागला. तिचा आधीचा ड्रायव्हर व्यसनी होता. रीनाला निर्व्यसनी ड्रायव्हर हवा झाला. निखिल शाळेत असल्यापासून जिम करायचा. त्यामुळे तंदुरूस्त दिसायचा. त्याच्या चालण्यातला, बोलण्यातला रूबाबही रीनाला आवडला. तिचा नवरा आता परदेशात सेटल झाला होता. रीनालाही तिकडेच बोलावलं होतं. मात्र, निखिल तिला ‘मित्रासारखा’ वाटू लागल्यावर तिने त्यालाही परदेशी येऊन त्यांच्याबरोबर राहण्याची गळ घातली. ती त्याला लाडाने ‘निक’ म्हणू लागली. निकला पैशांची फार गरज होती. त्यामुळे घरच्या माणसांचा तसा विरोध असतानाही त्याने ती नोकरी स्वीकारली. ‘मी तीन वर्षांनी परत आलो की लग्न करतो, नक्की!’ असं आश्वासन घरी देऊन टाकलं. ‘निक’ नशीब वगैरे मानत नव्हता. अशी संधी परत मिळणार नाही याची त्याला कल्पना होती.

परदेशी गेल्यावर तिथले काही रहदारीचे वेगळे नियम त्याने जाणून घेतले. तिकडच्या भाषेतले शब्द व्यवहारापुरते शिकू लागला. आपला मुलगा दुसऱ्या देशात भरपूर कमाई करतो याचा गर्व हळूहळू इकडे त्याच्या गावातील आईलाही वाटू लागला.

हळूहळू रीना निखिलला लाडेलाडे नको ती कामं सांगू लागली. त्याच्या भरदार शरीराचं कौतुक करू लागली. ‘माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. शोभत नाही तो मला. कदाचित तो ‘गे’ असेल. कारण तरूण मुलांचे त्याला इंडियात असताना सारखे फोन यायचे. तू मला तो घरी नसताना ‘सुख’ दे, मला आता तूच नवऱ्यासारखा आहेस असं रीनाने स्पष्टच सांगितलं. निखिलच्या मनात अशी कोणतीही वाईट भावना नव्हती. शिवाय रीना त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. निखिलला आवडणारी एक मुलगी प्रथमी त्याच्या गावातच राहायची. तो भारतात आल्यावर तिलाच मागणी घालणार होता. तिचं कॉलेज शिक्षण सुरू होतं. रीनाला त्याने स्पष्ट नकार दिला. ती त्याच्याशी लगट करू लागताच तिला त्याने ‘मॅडम प्लीज असं करू नका. मी फक्त जॉबसाठी इथं आलोय,’ असं म्हणत मागे ढकळलं. त्यांची झटापट झाली. रीना त्याला बेडवर खेचत होती, पण तसा अत्याचार होण्यापूर्वीच निखिलने झटकन बेडरूमबाहेर पडून दाराला बाहेरून कडी घातली. रीना त्याला फार वाईट अपशब्द बोलत होती. ‘तू माझ्या नवऱ्याच्या लायकीचा आहेस. त्याच्याबरोबर झोप तू. तू पण गे आहेस. तुला लाज वाटत नाही…’ म्हणत रीना दारावर लाथा मारती होती. निखिलने झटपट मिळतील ते कपडे बॅगेत भरले. पगार नुकताच झाला होता म्हणून काही रक्कमच त्याच्याकडे होती. घर सोडून फोन स्विच ऑफ करून तो घराच्या बाहेर पडला, पण जाणार कुठे? आता त्याच्याकडे कार नव्हती. हॉटेलात जेवण तर मिळालं, पण रात्र कुठे काढणार? हॉटेलचे दर परवडणारे नव्हते.

निक रस्त्यावरच झोपला आणि त्या रीना मॅमची इच्छा आपण पुरवायला हवी होती का? नोकरी सोडावी लागली नसती असा विचार त्याच्या मनात आला. पहाटे पुन्हा रीनाकडे जायचं आणि माफी मागून तिची वासना भागवत ही दोन-तीन वर्षं काढायची असं त्यानं ठरवलं. आपण पिंजऱ्यातले पोपट झालो आहोत, आपले पंख छाटले गेले आहेत हे निखिलच्या लक्षात आलं.

 

मात्र, त्यानंतर रात्री उशिरा जे घडलं, ते दुस्वप्न असतं तर बरं झालं असतं असं निकला वाटलं. दारू प्यायलेलं एक टोळकं तिथे फिरत आलं. ते गुंड निखिलला लाथा मारून उठवू लागले. तो घाबरून उठून बसला. ‘तुम्ही परदेशी, परके लोक आमच्या देशात येता. त्यामुळे आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत,’ अशा अर्थाची भाषा व शिव्या त्यांनी सुरू केल्या. त्यांच्याकडे लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिक्स होत्या. त्यांनी निकला इतकी बेदम व अमानुष माराहण केली की तो रक्तबंबाळ होऊन कोसळला. कुणी त्याला पाणीही पाजलं नाही. गुंड निघून गेले. घायाळ अवस्थेत निखिलला पहाटेपूर्वीच मरण आलं.

आपल्या महान देशाबद्दल प्रचंड राग असलेले अनेक माथेफिरू जगात आहेत. त्यांच्यापैकी एका टोळीने काहीही गुन्हा नसलेल्या निकचा बळी घेतला. तो भारतीय होता हाच त्याचा गुन्हा.

रीनाच्या ‘सोन्याच्या पिंजऱ्यातून’ निसटलेला हा निखिल नावाचा पक्षी कावळ्यांनी बाहेरच्या आसमंतात घेरून मारावा तसा ठार मारला. अरेरे! ‘मारा गया बेचारा’ एवढंच आम्ही गावकरी म्हणालो. हळहळत राहिलो… निकच्या खिशातील आयकार्डवरील रीनाच्या पत्त्यावर त्याची डेड बॉडी आणण्यात आली. तेव्हा रीनालाही रडू कोसळलं. ‘तू माझं का ऐकलं नाहीस निक’ म्हणत ती अश्रू ढाळत राहिली…

एकच प्रश्न

कथा * भावना गोरे

‘‘आकाश, तू आपल्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीस, अरे लग्नाला दहा वर्षं झालीत, पण अजूनही मला चिंटू गोटूपेक्षा तुझ्याकडेच जास्त लक्ष द्यावं लागतंय.’’ घाईघाईनं आकाशचा जेवणाचा डबा भरता भरता कोमल बोलत होती. तेवढ्यात आकाशचा फोन वाजला अन् तो घाईनं जाऊ लागला.

‘‘अरे, निदान डबा तरी घे…’’ हातात डबा घेऊन कोमल त्याच्या मागे धावली.

टिफिन घेताच आकाशची गाडी फुर्रकन निघून गेली.

आज कोमलला जरा निवांतपणा मिळाला. तिनं चहा करून घेतला अन् ती चहा घ्यायला शांतपणे खुर्चीवर बसली. लग्नानंतर कोमलला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं. त्या काळात सकाळचा चहा ती अन् आकाश एकत्रच घ्यायची.

शेजारी राहणाऱ्या शीला मावशींचा नवरा परदेशात होता. दोन्ही मुलंही मोठी होऊन परदेशी निघून गेलेली. पण ती मजेत एकटी राहायची. अभिमानानं म्हणायची, ‘‘जवळ नाहीएत तर काय झालं? पण दोन मुलगे आहेत ना माझे.’’

कोमलला स्वत:ला मूल नाही म्हणून फार वाईट वाटे. पण आकाश तिला धीर द्यायचा. ‘‘होतील गं, तुलाही दोन मुलगे होतील…डॉक्टरांनी सांगितलंय ना, होईल तुला बाळ…तू अजिबात काळजी करू नकोस.’’

त्याच्या प्रेमळ स्पर्शानं, आपुलकीच्या बोलण्यानं कोमलला खूप आधार वाटायचा. तिचं दु:ख कमी व्हायचं.

कोमलची शेजारीण दिव्या रेडिओवर नोकरी करत होती. तिची लहानगी मुलगी मिनी कोमलला खूप आवडायची. एकदा कोमल बाल्कनीत उभी होती. सहज नजर खाली गेली तर मिनी शाळेची बॅग घेऊन तिच्या घरासमोर बसून होती. घर बंद होतं. कोमलला वाईट वाटलं. तिनं मिनीला वर बोलावून घेतलं. तिला खायला प्यायला दिलं. मग दिव्याला फोन केला, तर समजलं की अचानक एक मीटिंग ठरली, त्यामुळे दिव्याला यायला उशीर होतोय. कोमलनं तिला म्हटलं, ‘‘मिनी माझ्या घरी मजेत आहे, काळजी करू नकोस.’’

‘‘दिव्या घरी परतल्यावर तिनं कोमलचे मनापासून आभार मानले.’’

‘‘यापुढे तू काळजी करू नकोस, तुला उशीर झालाच तर मी मिनीची काळजी घेईन.’’ कोमलनं म्हटलं.

दिव्यानं म्हटलं, ‘‘तुझ्या मदतीबद्दल खरंच आभारी आहे. पण आता अशी वेळ येणार नाही. मी एका पाळणाघराची व्यवस्था केली आहे. शाळेतून मिनीला सरळ पाळणा घरात सोडतील अन् मी कामावरून येताना तिला घेऊन येत जाईन.’’

‘‘म्हणजे मिनीचं माझ्याबरोबर राहणं तुला आवडत नाही का?’’ कोमल उदासपणे म्हणाली. तिचे डोळे भरून आले.

तिच्या खांद्यावर हात ठेवून दिव्यानं म्हटलं, ‘‘असं नाहीए गं! तुला हवा तेवढा वेळ तू मिनीबरोबर घालव. पण मला  असं वाटतं की माणसानं नेहमीच आत्मनिर्भर राहावं. स्वावलंबी असावं. मी नोकरी करते त्या मागचं कारणही हेच आहे. माझ्या नवऱ्याचे तीन तीन फार्म हाउसेस आहेत. मी आरामात घरी बसून खाऊ शकते. पण मला ते नाही आवडत. स्वत: कमावण्याचं सुख आणि आनंद वेगळाच असतो.’’

कोमलला तिचं बोलणं पटलं. स्वत: नोकरी करावी असं तिलाही वाटू लागलं अन् लवकरच तिला संधीही मिळाली.

दिव्याच्या ऑफिसमधली एक मुलगी आजारी पडली. दिव्यानं बॉसला विचारून कोमलला त्या जागी नोकरीला लावलं. कोमलचा आवाज रेडिओसाठी फारच योग्य होता. तिनं थोडं प्रशिक्षण घेतलं अन् लवकरच ती रेडियोची लोकप्रिय आर्टिस्ट ठरली. तिला रेडियोवर परमनंट नोकरी दिली गेली. या काळात आकाशनंही तिला प्रोत्साहन दिलं. ती आता अगदी आनंदात होती. त्याचवेळी तिला समजलं की ती आई होणार आहे. डॉक्टरांनी तिला जुळं होणार हेही स्पष्टपणे सांगितलं.

आता नोकरी की कुटुंब हा प्रश्न होता. कोमलनं कुटुंबाला प्राधान्य दिलं. बॉसला अडचण सांगितली अन् नोकरीचा राजिनामा दिला. बॉसनं तिची अडचण समजून घेतली.

नऊ महिने पूर्ण झाले अन् कोमलनं जुळ्या मुलांना जन्म दिला. दोन देखणे राजकुमार कुशीत आले अन् कोमलचं मन आनंदानं, अभिमानानं भरून आलं.

सासर माहेरची मदत नसताना एकट्यानं दोन बाळांना वाढवताना कोमल थकून    जायची. पण आकाश तिला अजिबात मदत करत नसे. कोमल आपल्याच विश्वात दंग होती. तिला आकाशमधला बदल पटकन् जाणवला नाही. तो हल्ली खूपच वेळ ऑफिसात असायचा. बरेचदा तो ऑफिसच्या टूरवर असायचा. कोमलनं स्वत:चीच समजूत घातली की कदाचित बाळाच्या वाढत्या खर्चामुळे तो ऑफिसमध्ये जास्त काम करत असेल. पण तरीही दोन्ही बाळांना त्यानं कधी जवळ घेतलं नाही की कोमलची कधी काळजी घेतली नाही. तो असा कसा वागतो तेही तिला समजत नव्हते. मुलं झाल्यावर नवराबायकोतलं प्रेम अधिकच वाढतं असं ती ऐकून होती. पण इथं तर उलटाच अनुभव येत होता.

आता कोमलला लक्षात आलं होतं की आकाशला तिचा स्पर्शही नको असतो. बघताबघता बाळं पाच वर्षांची झाली. पण आकाश मात्र त्यांच्यापासून दूरदूरच होता. मधल्या काळात कोमलला आकाशबद्दल काहीबाही ऐकायला येत होतं. पण तिचं भाबडं मन त्यावर विश्वास ठेवत नव्हतं.

एक दिवस दिव्यानं तिला म्हटलं, ‘‘तुला एक आमंत्रण आहे. ‘रेडिओ प्रेझेंटशन’चा एक कार्यक्रम होता. नव्या जुन्या सर्व आर्टिस्ट कर्मचाऱ्यांना आमंत्रण होतं. आकाश ऑफिसच्या दौऱ्यावर होता. तिनं मुलांना पाळणाघरात सोडलं आणि ती छान आवरून तयार झाली आणि दिव्याबरोबर हॉटेल सूर्यात पोहोचली. पार्टीला नुकतीच सुरूवात झाली होती, तेवढ्यात तिला आकाश एका मुलीबरोबर दिसला. तो इथं कसा? ऑफिसच्या टूरवर होता ना? ती त्याच्या मागे धावली. तोपर्यंत लिफ्टचा दरवाजा बंद होऊन ती वर निघून गेली होती. तिनं रिसेप्शनिस्टकडे चौकशी केली. तर मिस्टर आणि मिसेस आकाशच्या नावानं रूम नंबर ५०१ बुक केली होती. कोमलला एकदम घेरीच आली.’’

तेवढ्यात तिला शोधत आलेल्या दिव्यानं तिला सावरलं. तोंडावर पाणी मारून सावध केलं. तिला पार्टीत नेलं.

कोमलचे जुने बॉस तिला बघून खुश झाले. म्हणाले, ‘‘कोमल लोक अजूनही तुझी आठवण काढतात. तुला वाटेल तेव्हा तू परत ये नोकरीवर. यू आर मोस्ट वेलकम.’’

कशीबशी पार्टी आटोपून घरी पोहोचली अन् धाय मोकळून रडू लागली. काय दोष होता तिचा म्हणून आकाश असं वागत होता? तो सरळ वेगळा होऊ शकला असता. पण अशी फसवणूक? का म्हणून? तिनं आकाशला फोन केला. तो बंद होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश घरी आला. कोमलनं टूरबद्दल विचारलं तर थोडा भांबावला अन् हॉटेल सूर्यात कुणा स्त्रीबरोबर रूमनंबर पाचशे एकमध्ये गेल्याचं तिच्या तोंडून ऐकल्यावर चिडून तो अद्वातद्वा बोलू लागला. तिलाच दूषणं दिली अन् घराबाहेर निघून गेला.

कोमलला खात्रीच पटली. आता आकाशच्या आयुष्यात तिला स्थान नव्हतं. दोन मुलांच्या पित्याचा मान तिनं त्याला दिला होता. तिला वाटलं तो तिला अभिमानानं मिरवेल त्या उलट त्यानं तिला त्याच्या आयुष्यातून हाकलून लावलं होतं. कोमलनं परोपरीनं प्रयत्न केले, विनवलं, मुलांची शपथ घातली. भांडली, धमकीही दिली पण तो मख्ख होता. त्यानं एकच वाक्य म्हटलं, ‘‘तुला मुलांचा खर्च देतो पण माझ्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस.’’

कोमलला खूपच अपमान वाटला. ती आता माहेरीही जाणार नव्हती. कोर्टातून रीतसर डायव्होर्स घ्यायचा. मुलांना आपलंच नांव लावायचं अन् त्यांना स्वाभिमानानं वाढवायचं. नव्यानं आयुष्य सुरू करायचं.

तिला बॉसचे शब्द आठवले. ‘‘यू आर मोस्ट वेलकम.’’ तिनं फोन केला. नोकरी मिळेल का विचारलं. त्यांनी आनंदाने होकार दिला. ‘‘यू आर मोस्ट वेलकम.’’

शांतपणे बसून कोमलनं खूप विचार करून निर्णय घेतला. इतक्यात घर सोडायचं नाही. नोकरी सुरू करायची. आयुष्याची विखुरलेली, विस्कटलेली पानं गोळा करून पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करायचं. स्वत:ला सिद्ध करायचं. रडत कुढत बसायचं नाही. ताठ मानेने स्वाभिमानानं जगायचं.

एकच वाटत होतं…पुढे मागे आकाशला पश्चात्ताप झाला अन् तो परत आला तर? त्यानं क्षमा मागितली तर ती त्याला क्षमा करू शकेल? तेवढा एकच प्रश्न तिला छळत होता.

नजर भेटीचा खेळ

कथा * पूनव आरडे

नजरभेटीचा खेळ, दोन डोळ्यांनी, दुसऱ्या दोन डोळ्यांशी शब्दांशिवाय साधलेला संवाद हा माझ्या मते जगातला सर्वाधिक सुंदर आणि रोमांचक खेळ आहे (निदान सुरूवातीला तरी असंच वाटतं). या खेळातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चार डोळे हा खेळ खेळतात त्यांच्या पलीकडे कुणालाच त्याबद्दल काही शंका येत नाही. मीदेखील सुमारे एक वर्षांपूर्वी हा खेळ सुरू केला होता. इथं मुंबईत जुलै महिन्यात खूप पाऊस पडतो. आमच्या सोसायटीच्या बागेतल्या जॉगिंग ट्रेकवर पाण्यामुळे थोडं शेवाळं साचतं. तिथं पाय घसरण्याची भीति असते. खरं तर मला घराबाहेर म्हणजे सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर जायला अजिबात आवडत नाही. तिथलं ट्रॅफिक, बसचे हॉर्न, लोकांचा गोंगाट मला नको असतो. म्हणूनच कोलाहलापासून दूर सोसायटीच्या बागेत फिरणं हा माझा नित्यक्रम असतो.

हं, तर पावसाल्यातल्याच एका दिवशी मी घरापासून वीसएक मिनिटांच्या अंतरावर असेलल्या दुसऱ्या मोठ्या पार्कात सकाळच्या ब्रिस्क वॉकसाठी जात होते. तिथंच वाटेत तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. अवचितच आम्ही एकमेकांकडे बघितलं. त्या क्षणार्धाच्या नजरभेटीत जे घडायचं, ते घडून चुकलं होतं. मला वाटतं, हा डोळ्यांचाच दोष असावा. कुणाचे डोळे कुणाच्या डोळ्याला भिडले तर मग त्यावर काही उपाय नाहीए अन् मला वाटतं हाच चार डोळ्यांच्या नजरभेटीचा खेळ आहे.

हं! तर, जेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं तेव्हा काहीतरी घडलं. काय घडलं हे सांगणं, त्या क्षणाचं वर्णन करणं, त्या भावनांना शब्दरूप देणं अवघड आहे. पण इतकंच  आठवतं की तो सगळा दिवस फारच मस्त गेला. घरी परतताना वाहनांचे कर्कश्श हॉर्नदेखील जाणवले नाहीत. रस्त्यावरच्या कोलाहलानं वैताग आणला नाही. सकाळी सात वाजता मी हवेत उडंत अगदी आनंदानं गाणं गुणगुणत घरी आले.

२२ वर्षांची माझी मुलगी कोमल आठ वाजता कॉलेजला जाते. नवरा नऊ वाजता ऑफिसला जातो. मी रोजच्याप्रमाणे कोमलला हाक मारून किचनमध्ये शिरले. भराभर सकाळची कामं आवरली. दोघं निघून गेल्यावर सगळा दिवस मला खूप उत्साह वाटत होता. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा वॉकसाठी बाहेर पडले. पुन्हा त्याच जागी तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. आमची नजरानजर झाली. मनात, देहात एक गोड शिरशिरी जाणवून गेली. नकळत उत्साह संचारला…शरीर जणू पिसासारखं हलकं झालं होतं. नंतर पुढल्या तीनचार दिवसात मला अगदी स्पष्टपणे लक्षात आलं की तो माझा वाट बघतो. पुन्हा:पुन्हा वळून तो त्या वळणाकडे बघत असतो जिथून मी त्या रस्त्यावर येणार असते. मी अगदी दुरूनच त्याला पुन्हा:पुन्हा बघताना पकडलं होतं.

नजरभेटीचा हा खेळ खूपच छान सुरू झाला होता. दोघंही खेळाडू उत्सुकतेनं सकाळची वाट बघत असायचे. संडेला मी कधीच सकाळचा वॉक घेत नव्हते. त्या दिवशी माझा ब्रेक असायचा…आज मी संडेला बाहेर पडले तसं दचकून निखिलनं विचारलं, ‘‘अगं, कुठं निघालीस?’’

‘‘फिरायला…’’ मी उत्तरले.

‘‘पण आज तर रविवार आहे?’’

‘‘आता झोप उघडलीच आहे, तर जाऊन येते. तुम्ही अजून पडून रहा…मी आलेच!’’ म्हणत मी सरळ बाहेरचा रस्ता गाठला. बघितलं तर तो तिथं होताच. आज त्याचा मुलगा बरोबर नव्हता. बहुधा झोपला असावा रविवार म्हणून. पण आज तो त्याच्या पत्नीसोबत होता. मुद्दाम लक्षपूर्वक मी त्याच्या पत्नीकडे बघितलं. छान होती ती. सुंदर आणि स्मार्ट. मला आवडली. त्यानं मला बघितलं अन् बायकोची नजर चुकवून तो माझ्याकडे बघून चक्क हसला. प्रथमच हसला अन् माझ्या सकाळी उठून येण्याचं जणू सार्थक झालं.

म्हणजे आमच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी होतं. त्यामुळे माझ्यात खूपच बदल झाला होता. सकाळची वाट बघण्यात माझी सगळी दुपार, सायंकाळ अन् रात्रही संपत होती. दहा दिवसातच मी किती बदलले होते. संपूर्ण दिवस ही एक जाणीव की या वयातही कुणीतरी आपली वाट बघतंय, रोमांचित करायला पुरेशी होती.

हळूहळू एक महिना पूर्ण झाला. या खेळातल्या दोन्ही खेळांडूनी तोंडानं एक शब्दही उच्चारला नव्हता. डोळेच विचारायचे, डोळेच उत्तर द्यायचे.

एक दिवस नवऱ्यानं विचारलंच, ‘‘आजकाल तू सोसायटीच्या बागेत फिरत नाहीस का?’’

‘‘नाही, तिथं बुळबुळीत झालंय, मला घसरायची भीती वाटते.’’

‘‘पण तुला तर बाहेरचा कोलाहल आवडत नाही ना?’’

‘‘पण पाय घसरून पडण्यापेक्षा तो परवडला ना?’’ उत्तर दिलं मी, पण मनातून जरा अपराधीही वाटत होतं. तरीही या खेळात खूपच मजा वाटत होती म्हणून पुन्हा सकाळची वाट बघायला लागले.

आता खरं तर पावसाळा संपला होता, पण अजूनही बाहेरच्याच बागेत जात होते. ऑक्टोबर सुरू झाला होता. चार डोळ्यांच्या भेटीचा खेळ खूपच रोमांचक झाला होता. मला बाहेरचा कोलाहल आणि गर्दी आवडत नसतानाही केवळ त्याला बघण्यासाठी घाईनं बाहेर पडत होते. पूर्वीपेक्षा अधिक व्यवस्थित कपडे घालून, छान क्रीम पावडर लावून, नवीन टीशर्ट्स, नवीन ट्रॅकपॅन्ट्स, स्टायलिश बूट घालून, सेंटचा फवारा मारून, शोल्डरवर केसांची कधी उंच पोनी बांधून तर कधी केस मोकळे सोडून. त्यावेळी मला मी अगदी सोळा वर्षांची तरूणी असल्यासारखं वाटायचं. कसली धावायची मी…खरं तर सकाळचं फिरणं वर्षांनुवर्षं चाललंय. पण इतकी मजा यांपूर्वी कधीच आली नव्हती.

त्याच्या नजरेशी नजर भेटली की किती प्रश्न असायचे. डोळेच प्रश्न विचारत, डोळेच उत्तर देत. कधी सुट्टीच्या दिवशी उशीर झाला किंवा इतर दिवशी काही कारणानं खाडा झाला तर त्याचे डोळे तक्रार करायचे. त्याचं उत्तर मी डोळ्यांनीच, फक्त हसून द्यायची. कधी कधी तो बहुधा मुद्दामच बघत नसे. मग मीच त्याच्याकडे टक लावून बघायचे. मग तोही मनमोकळे हसायचा. खरंच किती मजेदार खेळ होता…थोडा विचित्रही होता…बोलायची गरजच नव्हती. सकाळी एकदा बघितलं की संपूर्ण दिवस मी एका अनामिक आकर्षणात गुरफटलेली असायचे. मला मग कुणाचा, कशाचा रागही येत नसे की विनाकारण चिडचिडही होत नसे. अगदी प्रसन्न मुद्रेनं, शांतपणे मी माझी घरातली कामं आटोपत असे.

निखिलना आश्चर्य वाटत होतं. एक दिवस त्यांनी म्हटलंच, ‘‘आता तर पावसाळाही संपलाय. जॉगिंग ट्रॅकवरचं वाळलेलं शेवाळंही खरबडून टाकलंय, तरीही बाहेरच्या मार्डनमध्ये जाते आहेस?’’

‘‘हो, जास्त मोठा अन् चांगला राऊंड होतो. इतकी वर्षं इथल्या बागेत फिरून फिरून कंटाळाही आलाय, हा बदल आवडलाय मला.’’

‘‘ठिक आहे. तुला आवडतंय तर काहीच हरकत नाही. फिरणं होतंय हेच महत्त्वाचं!’’ निखिलही फिरायला जायचे पण मी आल्यानंतर ते निघायचे.

त्यानंतर माझं कंबरेचं दुखणं उपटलं. मला खूप त्रास होऊ लागला. सकाळी वीस मिनिटं जायला, वीस मिनिटं यायला लागायची. आल्याआल्या दोघांचे लंच बॉक्स तयार करणं, ब्रेकफास्ट तयार करणं यातच मी दमायचे. पूर्वी मी अर्ध्या तासात घरी आलेली असायचे. दहा मिनिटं मला विश्रांतीसाठी मिळायची. डॉक्टरांकडे जाऊन आले. ते म्हणाले, ‘‘फिरण्याचा वेळ थोडा कमी करून बघा.’’ मी एकदम दचकले. बेचैन झाले. माझी दिनचर्या. दिवस रात्रीचा सर्व वेळ सध्या सकाळी त्याच्या भेटीशी जुळलेला होता. त्याला भेटायचं म्हणजे वीस मिनिटं चालत जायचं अन् वीस मिनिटं चालत परत यायचं. माझ्या दुखण्याने मी त्रस्त होते. थकवा यायचा. आता नियमित जाणं होईना. खाडे व्हायला लागले. कारण आल्यावर किचनमधल्या कामासाठीही एक संपूर्ण तास द्यावाच लागायचा. म्हणजे चाळीस मिनिटं व एक तास जर सलग सकाळी काम केलं तर सगळा दिवस माझी कंबर दुखत राही. अरे बापरे! आता काय करू? इतके दिवस एखाद्या षोडशीच्या उत्साहानं अन् आतुरतेनं रोमांचित होणारी मी…आता काय होणार? सगळं संपणार का?

निखिलला आश्चर्यही वाटत होतं. ते थोडे वैतागलेही होते. मला समजावत होते, ‘‘अगं, इतकी वर्षं इथंच वॉक घेत होतीस ना तर आता सकाळचं फिरणं बंद करून संध्याकाळी फिरायला जा. सकाळी कामं जास्त असतात. ती तर टाळता येणार नाहीत. म्हणून आपणच तोडगा काढायचा. सायंकाळी काम कमी असतात. त्यामुळे तुझ्यावर ताण येणार नाही. तब्येतीला थोडा आराम पडेल…’’

डॉक्टरांनीही हेच सांगितलं. पण मला ते पटेना. फारच विचित्र मन:स्थितीत होते मी. शरीराला विश्रांतीची गरज होती. पण मनाला आनंद तो दिसल्यामुळेच मिळायचा. त्याला बघण्यासाठीच मी बाहेरच्या रस्त्यावर, लांबच्या बागेत जात होते. पण आता खाडे फारच होऊ लागले.

त्याचा मुलगा एव्हाना छानपैकी सायकल चालवू लागला असावा. कारण आता तो एकटाच दिसायचा. नजरभेटीचा खेळ चालूच होता. माझ्या तब्येतीची काळजी न करता मी बाहेर जातच होते.

एक जानेवारीच्या सकाळी पहिल्यांदा त्यानं माझ्या जवळून जाताना, ‘हॅप्पी न्यू ईयर’ म्हटलं. मी ही आपली स्पीड करून, ‘‘थँक्स टू यू,’’ म्हटलं. इतक्या दिवसांच्या या आमच्या नजरभेटीच्या खेळात प्रथमच शब्दांचा वापर झाला. मन मयूर आनंदानं थुईथुई नाचायला लागलं.

आता माझी कंबर जास्त दुखत असली तरी मी कोमल आणि निखिलपासून स्वत:चं दुखणं लपवत होते. ती दोघं घराबाहेर पडली की दुखणारी कंबर शेकत सगळा दिवस लोळून काढायचे. कंबरेला बेल्ट बांधून असायचे. पण कितीही लपवलं तरी वेदना चेहऱ्यावर उमटायची. लेकीच्या लक्षात यायाचं. मग ती कधी प्रेमानं, कधी दटावून म्हणायची, ‘‘मॉम, नको त्रास करू घेऊस. डॉक्टरांनी नको म्हटलंय ना? संध्याकाळीच वॉक घेत जा, सकाळचं फिरणं बंद कर.’’

पण मी ऐकत नव्हते. कारण मी जगातल्या सगळ्यात आकर्षक आणि रोमांचक खेळातील खेळाडू होते.

मे महिना सुरू झाला अन् माझ्या जिवाची घालमेल वाढली. मे महिन्यात मी नेहमीच सायंकाळी फिरायला जायची. उन्हाळा, उकाडा मला अजिबात सहन होत नाही. आठ-दहा दिवस कशीबशी मी गेले. मुंबईतल्या चिपचिप्या उन्हाळ्यात सकाळीच इतकी घामाघूम होऊन जायची. पार थकलेली. आल्या आल्या लिंबूपाणी ढसकल्यावर खरं तर जागचं उठू नये असं वाटायचं…पण सकाळची कामं वाट बघत असायची. उठावंच लागायचं.

या उन्हाळ्यानं तर माझ्या मनाचा अगदी अंतच पाहिला. यावेळचा उन्हाळा तर या चार डोळ्यांच्या खेळातला महत्त्वाचा टप्पा होऊन आला. कितीही प्रयत्न केला तरी मी उन्हाळ्यात रोज नियमित फिरायला जाऊ शकले नाही. सुट्टीच्या दिवशी आवर्जून जायचे. कारण घरी परतल्यावर स्वयंपाक घरात शिरण्याची घाई नसे. त्याला बघण्याचा मोह अनावर होता. पण उन्हाळा अन् काहिली त्यावर मात करत होती. घाम पुसता पुसता जीव नकोसा व्हायचा. त्याला बघून आल्यावर ठरवायचे की आता नाही जाणार…उकाडा सहन होत नाही. मी कुणी सोळा वर्षांची तरूणी आहे का जी प्रियकरासाठी वेडीपिशी होते. नवरा आहे, मोठ्या वयाची मुलगी आहे, अरे मी एक संसारी, मॅच्युअर स्त्री आहे. मी कशाला त्याला भेटायला धावत जावं? अन् इतक्या महिन्यांत नेमकं मिळवलं काय? मला काही त्याच्याशी अफेअर करायचं नाहीए की पुढे संबंध वाढवायचे नाहीएत. जे झालं, ते पुरे झालं. ही बाब इतकी महत्त्वाची नाहीए. उन्हाळा वाढत होता. माझी अक्कल ठिकाण्यावर येत होती. सगळा उत्साह, रोमांस, रोमांच…सगळंच संपल्यात जमा होतं. उन्हाळा, कंबरेचं दुखणं आणि घरकाम या त्रयीनं मला या खेळात पराभूत केलं होतं. मनातून अजूनही त्या पार्कात जावंसं वाटायचं पण प्रत्यक्षात ते जमणं शक्य नाही हे ही समजत होतं.

खरं तर मनात, हृदयात खळकन् काही तरी फुटलं होतं. पण मग स्वत:चीच समजूत घातली की ठीक आहे. जीवन आहे…असंच चालायचं…होतं असं कधीकधी. हे वय, ही वेळ, या जबाबदाऱ्या खरं तर या खेळामध्ये नसाव्यात…पण माझ्यावर त्या आहेत. नजरभेटीच्या या खेळात मी आपला पराभव मान्य केला होता. ‘ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गंमतीची’ ही ओळ आता आयुष्यातून मी पुसून टाकली होती अन् पूर्वीप्रमाणेच आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये सायंकाळी फिरायला जायला लागले होते.

मावा गुटखा हद्दपार

कथा * पूनम अत्रे

संध्याकाळी सहा वाजता ऑफिसमध्ये लोक एक एक करून निघायला लागले, तशी सियानंही आपलं सामान आवरता आवरता एक चोरटी नजर अनिलकडे टाकली. ऑफिसमध्ये नवाच आलेला सर्वात देखणा, उमदा, हसरा, मनममिळाऊ अनिल तिला बघताच आवडला होता. चुंबकासारखी ती त्याच्याकडे ओढली गेली होती.

त्याचवेळी अनिलनंही तिच्याकडे बघितलं अन् दोघंही हसले. एकाच वेळी आपापल्या खुर्च्यांमधून दोघं उठले. लिफ्टपर्यंत सोबतच आले. अजून तीनचार लोक लिफ्टमध्ये होते. सियाच्या लक्षात आलं की अनिलही तिच्याकडे चोरट्या नजरेनं बघत असतो.

गेटमधून बाहेर पडल्यावर अनिलनं विचारलं, ‘‘सिया, तुम्ही कुठं जाणार आहात? मी स्कूटरवरून सोडू तुम्हाला?’’

‘‘नको, थँक्स! मी रिक्षानं जाते.’’

‘‘या ना? एकत्रच जाऊयात…’’

‘‘बरं…’’

अनिलनं बाईक स्टार्ट केली. सिया मागे बसली. अनिलच्या कपड्यांना येणारा सेंटचा मंद सुवास सियाला आवडला. बनारसच्या या ऑफिसात दोघंही नवीनच होते. सियाची नियुक्ती त्याच्या आधी झाली होती.

अनिलनं एकाएकी गाडी रस्त्याच्या कडेला घेत थांबवली. तसं दचकून सियानं विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘काही नाही,’’ म्हणत अनिलनं खिशातून गुटख्यांची पुडी काढली अन् अगदी स्टायलिशपणे गुटखा तोंडात टाकला. मग हसून सियाकडे बघितलं.

‘‘हे काय?’’ सियानं दचकून विचारलं.

‘‘माझा फेवरेट पानमसाला…मावा?’’

‘‘तुम्हाला याची सवय आहे?’’

‘‘हो. अन् ही माझी स्टायलिश सवय आहे…’’

सियाच्या कपाळावर आठ्या अन् चेहऱ्यावर तिरस्कार बघून त्यानं विचारलं, ‘‘का? काय झालं?’’

‘‘या सगळ्या तुमच्या आवडी आहेत?’’

‘‘हो…पण काय झालं?’’

‘‘नाही, काही नाही…’’ सिया पुढे काहीच बोलली नाही, तशी अनिलनं बाइक स्टार्ट केली.

हळूहळू हे रोजचं रूटीन झालं. ऑफिसला येताना सिया रिक्षानं यायची. परतताना अनिलच्या स्कूटरवरून जायची. तिच्या घराच्या थोड्या अलिकडेच तो तिला सोडायचा. हळूहळू दोघांची मैत्री वाढत होती.

अनिलला मॉडर्न, स्मार्ट, सुंदर सिया फारच आवडली होती. आपली आयुष्याची जोडीदार म्हणूनच तो तिच्याकडे बघत होता. हीच स्थिती सियाचाही होती. दोघांनाही खात्री होती की त्यांची निवड त्यांच्या घरातल्यांनाही आवडेल.

अनिलनं तर सियाची निवड फायनल केलीच होती पण सिया मात्र एका मुद्दयावर थोडी अडखळत होती. अनिलची सतत गुटखा, मावा किंवा पानमसाला तोंडात भरायची सवय तिला फारच खटकायची. तिनं अनिलला अनेकदा याबद्दल समजावलंही, त्यातले धोके, आरोग्याची हानी वगैरे विषय तो थट्टेवारीने न्यायचा.

‘‘काय तू म्हाताऱ्या आजीबाईसारखा उपदेश करतेस, अगं आमच्याकडे सगळेच खातात, तूही बघ खाऊन, आवडेलही तुलाही…माझी आई आधी वडिलांवर ते गुटखा खातात म्हणून चिडायची. रागारागानं स्वत:ही खायला लागली अन् आता तिला आवडायलाही लागलाय. आता सगळेच खातात म्हटल्यावर कोण कुणाला हटकणार? छान चाललंय आमचं.’’ हे वर सांगायचा.

सियाला संताप यायचा. रागावर नियंत्रण ठेवून ती म्हणायची, ‘‘पण अनिल, तू इतका शिकलेला, समजूतदार आहेत. तू ही सवय सोडायला हवीस, तुझ्या आईबाबांनाही समजावायला हवं.’’

‘‘सोड गं! काय पुन्हा पुन्हा तू त्याच विषयावर येतेस? आपल्या भेटीतला निम्मा वेळ तर याच विषयात संपतो. तू ते सुंदर गाणं नाही ऐकलंस का? ‘पान खाए सैंया हमारों…’ वहिदा रहमाननं काय सुंदर अभिनय केलाय त्या नृत्यात? तू ही तशीच अभिमानानं सांग ना, गुटखा खाए सैंया हमारों…’’

‘‘ते सगळं सिनेमात असतं. तिथंच शोभतं.’’

अनिल बराच चेष्टा मस्करी करून तिला हसवायचा, पण त्याची ही सवय कशी सोडवायची हे सियाला समजत नव्हतं.

एक दिवस सियानं आपले आईबाबा आणि थोरला भाऊ यांना भेटायला अनिलला आपल्या घरी बोलावलं. अनिलचं एकूणच व्यक्तिमत्त्व असं होतं की तो बघताक्षणीच सर्वांना आवडायचा. छान गप्पा रंगल्या, चहाफराळ, हास्य विनोद चालू असताना मध्येच अनिलनं, ‘‘एक्सक्यूज मी,’’ म्हणत खिशातून पानमसाल्याची पुडी काढून तोंडात गुटखा कोंबला, तेव्हा सर्वच चकित होऊन गप्प बसून राहिले.

अनिल निघून गेल्यावर तिला जे वाटलं होतं, तसंच घडलं. सियाची आई म्हणाली, ‘‘मुलगा तसा खूप चांगला आहे, पण त्याला ही सवय जर असेल तर…’’ भाऊ, बाबा सगळ्यांचंच मत तेच होतं. सियानंही म्हटलं, ‘‘खरंय, मलासुद्धा त्याची ही सवय अजिबात आवडत नाही, पण ती सोडवू कशी ते ही कळत नाहीए.’’

त्यानंतर थोड्याच दिवसांनी अनिलनं सियाला आपल्या घरी नेलं. अनिलचे आईबाबा, धाकटी बहिण, सगळ्यांनी तिचं प्रेमानं स्वागत केलं. सगळ्यांनाच सिया अन् सियालाही सगळी माणसं खूप आवडली. अनिलच्या आईनं तर तिला जेवणासाठी थांबवूनच घेतलं. गप्पा मारता मारता मदतही करावी म्हणून सिया स्वयंपाकघरात आली. सियाला दिसलं की फ्रीजमधलं एक शेल्फ विड्यांनी (पानाचे विडे) भरलेलं होतं.

‘‘हे…इतके विडे?’’ आश्चर्यानं तिनं विचारलं.

‘‘अगं हो,’’ हसून अनिलच्या आईनं म्हटलं, ‘‘आम्हा सर्वांना सवय आहे. बनारसचे विडे (खायके पान बनारसवाला) तर प्रसिद्धच आहे ना.’’

‘‘पण…आरोग्याच्या दृष्टीनं…’’

‘‘सोड गं! पुढलं पुढे बघूयात…’’ त्यांनी हसून विषय टाळला.

किचनमध्ये एका बाजूला दारूच्या बाटल्यांचाही ढीग दिसला. सिया बाथरूममध्ये गेली अन् तिला एकदम मळमळायलाच लागलं. बाहेरून इतकं सुंदर, श्रीमंत घर पण बाथरूम केवढा गलिच्छ शी:! सगळीकडे पान मसाला, गुटख्याची रिकामी पाकिटं अन् जिथं तिथं थुंकलेलं…शी गं बाई! सभ्य, सुसंस्कृत घराचं हे रूप तर किळस आणणारं होतं. जर या घरात ती सून म्हणून आली तर तिचं आयुष्य हे पानाचे डाग अन् गुटख्याची पाकिटं उचलण्यातच जाणार का? कसंबसं तिनं जेवण आटोपलं. अनिलनं तिला घरी सोडलं.

सियाच्या मनात विचारांचा कल्लोळ होता. अनिल आयुष्याचा जोडीदार म्हणून चांगला होता. घरातली माणसंही प्रेमळ, समंजस होती, पण दारू, पानमसाला पान खाऊन थुंकणं या सगळ्या गोष्टी तिला न मानवणाऱ्या होत्या. तिच्या स्वच्छतेच्या अन् आरोग्याच्या, पर्यावरणाच्या कल्पनेत ते बसतच नव्हतं. घरी आल्यावर ती कुणाशीच काही बोलली नाही. पण तिचा विचार मात्र पक्का ठरला होता. दोन तीन दिवस ती अनिलपासून दूरच राहिली. सियाच्या या वागण्यामुळे अनिल चकितच झाला. ती असं का करतेय हे त्याच्या लक्षात येईना. शेवटी सिया घरी जायला निघाली, तेव्हा त्यानं तिचा हात धरला अन् तो तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेला. तिथं बसल्यावर त्यानं विचारलं, ‘‘काय झालंय? काही सांगशील की नाही?’’

सिया याच क्षणाची वाट बघत होती. शांत, संयमित आवाजात ती म्हणाली, ‘‘अनिल, मला तू खूप आवडतोस. पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार…’’

‘‘का?’’ अनिल आश्चर्यानं ओरडलाच.

‘‘तुला अन् तुझ्या कुटुंबातल्या माणसांना ज्या काही सवयी आहेत, त्या मला सहन करता येणार नाहीत. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, तुम्हाला कळत नाही का? अरे कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो…परिसर, पर्यावरण घाण होतं हे तुम्हाला जाणवत नाही का? कधी तरी सणावाराला, गोडाधोडाचं जेवण झाल्यावर एखादा विडा खाणं अन् सतत गुटख्याचे, पानाचे तोबरे करणं यात फरक आहे ना? अश्या घाणेरड्या सवयी असलेल्या कुटुंबात सून म्हणून मी राहू शकत नाही. सॉरी अनिल. मला ते जमणार नाही.’’

अनिलचा चेहरा पडला होता. कसाबसा तो एवढंच बोलू शकला, ‘‘सिया, मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.’’

‘‘होय अनिल, मलाही तुझ्यापासून दूर जायचं नाहीए. पण ही व्यसनं मला सहनच होत नाहीत. माझ्या तत्त्वात ते बसत नाही. आय एम सॉरी…’’ ती खुर्चीवरून उठली.

अनिलनं तिचा हात धरला. ‘‘सिया, मी जर हे सगळं सोडायचा प्रयत्न केला तर? आईबाबांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर?’’

‘‘तर या प्रयत्नात मी तुझ्या बरोबरीनं मदत करेन.’’ सियानं हसून खात्री दिली.

‘‘पण यात श्रम अन् वेळ दोन्ही लागणार आहे. निग्रहाची कसोटी असेल, हे लक्षात ठेव.’’

बाय करून सिया निघून गेली. आत्मविश्वासानं पावलं टाकत जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अनिल विचार करत होता.

सवयीनं हात खिशाकडे गेला. अन् दुसऱ्याच क्षणी विजेचा झटका बसावा तसा बाहेर आला. तो पार बावचळला होता. दोन्ही हातांनी डोकं धरून बिचारा बसून राहिला.

तू बदलली आहेस

कथा * सुमन बेहरे

‘‘अहो, चला ना, आपण कुठंतरी बाहेर आठदहा दिवस फिरून येऊयात. राघवही त्याच्या मित्रांसोबत सिंगापूरला ट्रिपवर गेलाय. आपण किती दिवसात कुठंच गेलो नाही.’’ सुनयनानं नवऱ्याला, जयला खूपच गळ घातली.

‘‘मला कुठंही जायचं नाहीए. माझा अगदी संताप होतो कुठंही जायचं नाव काढलं म्हणजे, काय मिळतं बाहेर जाऊन? यायचं तर पुन्हा घरीच ना? मग जायचं कशाला? ट्रेनचा प्रवास करा, थका, हॉटेलात राहा अन मूर्खासारखे इथे तिथे फिरा. विनाकारण इतकाले पैसे खर्च करायचे अन् प्रवास करून आल्यावर दमलो म्हणून पुन्हा घरी आल्यावर दोन दिवस विश्रांती घ्यायची. सगळी दिनचर्या विस्कळीत होते. मला कळतच नाही, तुला सतत ‘फिरायला जायचं’ एवढंच का सुचतं? मला नाही आवडत कुठं जायला हे ठाऊक असूनही आपलं, फिरायला जाऊचं तुणतुणं’’ जय संतापून ओरडला.

‘‘तुम्हाला नाही आवडत हे मला ठाऊक आहे, पण कधीतरी दुसऱ्याला आवडतं म्हणूनही काही करावं ना? बावीस वर्षं झाली लग्नाला, तुम्ही कधीतरी कुठं घेऊन गेलात का? राघवही बिचारा किती वाट बघायचा. बरं झालं तो तुमच्यासारखा संतापी अन् खडूस नाहीए ते! त्याला आवडतं प्रवास करायला. प्रत्येक मुलीला इच्छा असते लग्नानंतर नवऱ्याबरोबर प्रवासाला जावं. रोजच्या रूटीन आयुष्यातून वेळ काढून थोडं वेगळं आयुष्य जगावं. त्यामुळे पुन्हा कामं करायला, आपलं आयुष्य जगायला नवा उत्साह मिळतो. नव्या जागी, नवे लोक भेटतात, नवं काही खायला, बघायला, ऐकायला मिळतं. लोक काय वेडे आहेत का? उगीच ते   प्रवासाला जातात? तुम्हीच आहात जगावेगळे आणि अत्यंत चिक्कू, कंजूष. पैसा खर्च करायचा म्हटला की पोटात गोळा येतो तुमच्या. कधी तरी बायकोच्या, मुलाच्या भावनांना किंमत द्या, समजून घ्या. छोट्या छोट्या आनंदालाही का मुकायला लावता आम्हाला?’’ सुनयनाच्या मनातला सगळा संताप, सगळी खदखद आता बाहेर पडली.

‘‘उगीच मूर्खासारखी बडबडू नकोस अन् राघवचं काय सांगतेस? अजून लग्न नाही झालंय त्याचं. संसारासाठी पैसा खर्चावा लागेल, तेव्हा हे प्रवासाचं भूत पार उतरेल. सध्या तरी बापाच्या जिवावर चंगळ चाललीये त्याची.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नका, तुम्ही थोडीच दिलेत त्याला पैसे. त्याच्या ट्रिपचा सगळा पैसा मी दिलाय.’’ सुनयना संतापून म्हणाली.

‘‘मग त्यात काय मोठेपणा? उपकार केलेस का माझायावर? कमवते आहेस म्हटल्यावर खर्चही करायलाच हवा. सगळा पैसा काय तू स्वत:वरच खर्च करणार का?’’

दोघांमधला वाद वाढतच चालला. ही काही आजची नवी बाब नव्हती. नेहमीच त्यांच्यात खूप वाद व्हायचे. थोडेफार मतभेद असू शकतात. पण जयचा स्वभावच फार विचित्र होता. तो स्वत: कधीच खळखळून हसतही नसे. इतरांना आनंदात बघायलाही त्याला आवडत नसे. सुनयनाच्या प्रत्येक गोष्टीत दोष काढणं, तिच्या कुठल्याही म्हणण्याला नकार देणं यात त्याला विकृत आनंद मिळायचा.

‘‘मी ही ठरवलंय…कुठं तरी फिरून येईनच!’’ सुनयनानं जयला जणू आव्हानच दिलं. तिला माहीत होतं की हल्ली बऱ्याच टूरिस्ट कंपन्या लेडिज स्पेशल, ओन्ली लेडीज अशा ट्रिपा काढतात. सगळी व्यवस्था अगदी उत्तम असते. स्त्रिया अगदी सुरक्षित व बिनधास्त प्रवास करू शकतात.

तिनं गूगलवर अशा प्रवासी कंपन्यांची माहिती काढली. एका कंपनीचं नाव वाचून क्लिक केलं, तेव्हा व्यवस्थापक स्त्रीचं नाव ओळखीचं वाटलं. तिचं प्रोफाइल बघताच सुनयनाचे डोळे आनंदानं चमकले. मानसी तिची कॉलेजातली मैत्रीण होती. लग्नानंतर सुनयनाचा तिच्याशी संपर्क नव्हता. जयला सुनयनाचे माहेरचे, इतर नातलग किंवा मित्रमैत्रीणी कुणाशीच संबंध नको होते. त्यामुळे सुनयनानं सर्वांशी फारकत घेतली होती.

तिनं मानसीचा फोन नंबर मिळवला अन् फोन केला. मानसीला खूप आनंद द्ब्राला. ‘‘सुनयना, अगं किती दिवसात तुझा आवाज ऐकतेय…कुठं आहेस? काय करते आहेस?’’

दोघींच्या गप्पा इतक्या रंगल्या की सांगता येत नाही. गप्पांमधूनच सुनयनाला कळलं की त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या अजून दोघीजणीही त्या लेडीज स्पेशल टूरवर जाताहेत.

‘‘आता पुढली ट्रिप कधी आहे तुझी? अन् कुठं जाणार आहात? मलाही यायचंय.’’

‘‘अगं तर मग आताच चल ना? चार दिवसांनी आमची लद्दाखची टूर आहे. दहा दिवसांची टूर आहे. सगळी तयारी झालीय. तुला ही घेते मी त्यात. खूप मज्जा येईल. येच तू. खूप जुन्या आठवणी आहेत. त्यांची उजळणी करू. हो, अन् तुला स्पेशल डिस्काउंटही देईन.’’

‘‘मी नक्की येते. फक्त काय तयारी करावी लागेल तेवढं सांग. अशी संधी पुन्हा मिळणार नाही.’’

जयला जेव्हा तिनं हे सांगितलं, तेव्हा तो प्रचंड संतापला. ‘‘काय डोकंबिकं फिरलंय का तुझं? इतका पैसा विनाकारण खर्च कशाला करायचा? ज्यांच्याबरोबर तू जाते आहेस ना? त्या सगळ्या बायका फ्रस्टेटेड असतात. एकतर त्यांची लग्नं झालेली नसतात किंवा त्यांना नवऱ्यानं टाकलेलं तरी असतं. म्हणूनच असे ग्रुप करतात त्या. नाही तर नवऱ्यासोबत गेल्या नसत्या? कुणास ठाऊक प्रवासात या काय काय करतात? प्रवासाच्या नावावर कसले धिंगाणे घालतात? काही गरज नाहीए तू त्यांच्याबरोबर जाण्याची. अशा सिंगल बायकांच्या आयुष्यात पुरूष नसतात म्हणून त्या आपसातच संबंध ठेवत असतात. नाही पुरूष तर स्त्रीबरोबर संबंध…या सगळ्या बेकार बायका असतात. एक्सपेरिमेंट म्हणून काहीही करतात. स्वत:ला मारे इंटेलेक्चुअल म्हणवतात, समाज सेवेच्या मोठमोठ्या गोष्टी करतात, पण खरं तर सेक्सुअल प्लेजर हवा असतो त्यांना. तो मिळतच नाही म्हणून मग असले धंदे…तुला तर माझ्याकडून काही कमी पडत नाहीए ना?’’

‘‘शी:! किती घाणेरडा विचार करता हो तुम्ही? मला खरंच कीव येते तुमची. एकटी स्त्री काही करते ती फ्रस्टेट असते म्हणून करते हे कुणी सांगितलं तुम्हाला? फक्त आपला आनंद मिळवला तर त्याला इतकं विकृत रूप द्यायचं? आणि हे सेक्सुअल प्लेजरबद्दल कुठून कळलं तुम्हाला? उगीच काही तरी बोलायचं…मी जात नाही पण तुम्हाला मला फिरायला न्यावं लागेल, आहे कबूल?’’ जय सुनयनाच्या बोलण्यानं ओशाळला तर होता. न बोलता खोलीत निघून गेला.

मानसी आणि दोन जुन्या मैत्रिणी अचला, निर्मला यांना भेटून सुनयना खूपच आनंदली. किती छान वातावरण होतं. एकत्र भटकणं, हास्य विनोद, एकत्र चहा, जेवण खरोखरच तिला इतकं मोकळं मोकळं अन्  छान वाटत होतं. कुणाची काळजी नव्हती, घराची चिंता नव्हती…अगदी मुक्तपणे जगत होती ती. लदाखच्या त्या भूमीत तिला जणू स्वर्गसुखाचा साक्षात्कार झाला. आजही तिथं आधुनिकतेला वाव नाही. परंपरा जपल्या जातात. तिथली स्वच्छ हवा, निळंशार पाणी. हातात घेता येतील इतक्या उंचीवरचे ढग, सगळंच अद्भूत होतं. आजही तिथं बुद्धधर्माचा बराच प्रभाव आहे. तिथले लोक, त्यांचं आयुष्य, त्यांची संस्कृती हे सगळं खूप वेगळं आहे. अन् तरीही आपलं आहे. डोंगरात बसलेल्या छोट्या छोट्या वस्त्या, उंच स्तूप, मठ सगळंच कसं अद्भूत.

सुनयनाला वाटलं, गेल्या बावीस वर्षांत ती प्रथमच आपल्या मर्जीनुसार जगतेय. जयची कटकट नाही, त्याचे टोमणेही नाही, किती बरं वाटतंय. तिनं ठरवलं यपुढे मानसीबरोबरच इतरही अनेक प्रवास करायचे. तिची सगळी  मरगळ, सगळा थकवा पार नाहीसा झाला होता.

दहा दिवस कसे संपले कळलंच नाही. पूर्ण रिलॅक्स मूडमध्ये ती परतली. तेव्हा प्रवास संपवून राघवही परत आला होता. दोघंही उत्साहानं प्रवासातले आपापले अनुभव एकमेकांना सांगत होते, तेवढ्यात जय भडकून ओरडला, ‘‘असा काय मोठा दिग्विजय करून आला आहात? इतका आनंद कशासाठी? अन् तू गं सुनयना? इतकी फ्रेश अन् सुंदर दिसते आहेस, काय आहे विशेष? त्या  फ्रस्टेटेड बायकांची कंपनी खूपच आवडलेली दिसतेय. त्यांच्याचसारखी झालीस की काय तू?’’

कित्ती विकृत आहे हा माणूस? काहीच चांगलं मनात येत नाही का त्याच्या? जयच्या या घाणेरड्या अन् विकृत विचारसरणीला कंटाळलेली सुनयना आता तर त्याचा तिरस्कारच करू लागली. ती त्याला टाळायलाच बघायची. त्याच्या घाणेरड्या बोलण्यामुळे ती फार दुखावली जायची. आता तर त्यांच्या नात्यातला ताण खूपच वाढला होता. तो इतके घाणेरडे आरोप करायचा की तिच्या मनात त्याच्याविषयी चीड अन् चीडच उत्पन्न व्हायची. तो सेक्ससाठी जवळ आला तर ती त्याला झटकून टाकायची. मन असं दुखावलेलं असताना शरीर साथ देत नाही. तिला ते सांगता येत नव्हतं. समजून घेणं जयला येतंच नव्हतं.

सुनयनाच्या वागण्यानं तो अधिकच संतापत होता. एका रात्री तो तिच्यावर बळजबरी करणार तेवढ्यात तिनं त्याला धक्का देऊन दूर लोटलं. संतापलेला जय ओरडायला लागला, ‘‘मला कळंतय तुझं वागणं. त्या बायकांची कंपनी हवीय तुला…मग नवऱ्याची सोबत कशी आवडेल? तुला आता तिच चव चाखायची आहे…मानसीबरोबर मैत्री खूपच वाढली आहे तुझी.’’

‘‘काय बोलताय तुम्ही? काय ते स्पष्ट सांगा ना?’’ सुनयनानं म्हटलं.

‘‘स्पष्ट काय सांगायचं? स्वत:च समजून घे.’’

‘‘नाही जय, मला तुमच्याच तोंडून ऐकायचंय. प्रवासातून परत आल्यापासून बघतेय, सतत तुम्ही टोमणे मारताय, काहीही बोलताय…असं काय बदललंय माझ्यात? का असे वागता?’’ संतापानं लाललाल झाली होती सुनयना.

‘‘तू तर पूर्णपणे बदलली आहेस, मला तर वाटतंय की तू ‘लेस्बियन’ झाली आहेस. म्हणूनच तुला मी, माझा स्पर्शही नको वाटतो.’’

सुनयना अवाक् झाली. जयनं त्यांच्या नात्याच्या पावित्र्याच्याच चिंधड्या उडवल्या होत्या. अगदी निर्लज्जपणे तो आपल्या बायकोला लेस्बियन म्हणतोय? व्वा रे, पुरूष! धन्य तो पुरूष प्रधान समाज, जिथं महिला मैत्रिणींसोबत फिरल्या तर त्यांना लेस्बियन म्हणतात अन् पुरूषांबरोबर बाहेर गेल्या तर त्यांना चारित्र्यहीन ठरवलं जातं. हे असं का? तिचं डोकं भणभणायला लागलं.

हल्ली जय रोजच रात्री उशीरापर्यंत घराबाहेर असायचा. तिनं विचारलं तर म्हणायचा, ‘‘मी माझ्या मित्रांसोबत असतो. पण मी ‘गे’ नाही.’’ अधूनमधून कुणी तरी सांगायचं की त्याचे इतरत्र अनेक स्त्रियाशी संबंध आहेत. त्यांच्याबरोबर तो फिरतो, हॉटेलात अन् सिनेमालाही जातो…अन् इतरही सगळंच! सुनयनाला या गोष्टींवर विश्वास ठेवावा असं वाटत नव्हतं पण एकदा त्याच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग बघितले अन् तिची खात्रीच पटली. खरं तर जयच्या मित्रांनी हे तिला सांगितलं होतं, पण तिनं त्याकडे दुर्लक्षच केलं होतं.

रात्री दारू पिऊनच जय घरी आला होता. दार उघडताच दारूचा भपकारा आला. सुनयनानं त्याला काही विचारण्यापूर्वीच तो ओरडू लागला, ‘‘माझ्यावर पाळत ठेवतेस? हेर लावलेत का माझ्या मागे? स्वत: तर लदाखला जाऊन मजा मारून आलीस अन् मलाच दोष देतेस? स्वत: बदलली आहेस, मला सेक्स सुख देत नाहीस तर मी ते दुसरीकडून मिळवेनच ना? माझे संबंध आहेत स्त्रियांशी…पुरूषांशी नाहीत, तू लेस्बियन झाली आहेस…पण मी ‘गे’ नाही…’’

‘‘जय, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही माझा अपमान करता. जिव्हारी लागेल असं बोलता अन् माझ्याकडून शरीर सुखाची अपेक्षाही करता? मी नाही त्यावेळी तुम्हाला साथ देऊ शकत. याचा अर्थ मी लेस्बियन आहे असा नाही होत.’’

जय तर एव्हाना अंथरूणात कोसळला होता. घोरायलाही लागला होता. सुनयनाला कळतच नव्हतं की तो तिला एकटीनं प्रवास करून आल्याची शिक्षा का देतोय की इतर स्त्रियांशी संबंध ठेवायचे म्हणून तिला त्यानं लेस्बियन ठरवली आहे.

नास्तिक बायको

कथा * माधव गवाणकर

श्वेता सासरी गेल्यावर तिच्या मम्मी आणि पप्पांना घर खायला उठलं होतं. बडबडी, बोलकी, मनमोकळी अशी ती मुलगी. मम्मीला फक्त एकच गोष्ट खटकायची की श्वेता देवधर्म, कर्मकांड वगैरे मानत नव्हती. कर्मकांडाला तिचा नकार असायचा. ‘गोडधोड कधीही करावं, सण उत्सव कशाला हवा? दिवाळीचा फराळ तर आता वर्षभर मिळतो. आपली ऐपत आहे. मग काय प्रॉब्लेम आहे.’ अशी श्वेताची वेगळी विचारसरणी होती. तिला त्यात काही प्रॉब्लेम नसला तरी सासरच्या लोकांना तिचा प्रॉब्लेम होऊ लागला. श्वेताचा नवरा आकाश बराचसा सुपरस्टारसारखा दिसायचा. ‘सेम रोशन वाटतो गं’ अनेक बायका त्याच्याकडे वळून वळून बघत. श्वेताचा मैत्रिणी हेवा करत. जिमला जाणारा असा देखणा पती मिळाल्यामुळे श्वेताचं वैवाहिक जीवन छान बहरू लागलं होतं. प्रणयाला एक वेगळीच धुंदी चढायची, पण एके दिवशी आकाश तिला म्हणाला, ‘‘केवळ माझ्या आईबाबांसाठी तू रोज पूजा करत जा…प्लीज. प्रसाद म्हणून खोबरं वाटायला तुला काय प्रॉब्लेम आहे. फक्त आठवड्यातून एकदा उपवास कर. आईला समाधान मिळेल की सून सुधारली.’’

श्वेता थोडी रागावून म्हणाली, ‘‘सुधारली म्हणजे? नास्तिक बाई बिघडलेली, उनाड असते का? भक्ती ही सक्ती असता कामा नये. मला नाही पटत तर जबरी कशाला? मी कधीच माहेरी उपवास केलेले नाहीत. मला पित्ताचा त्रास आहे. तो वाढेल. शिवाय मी मुळात कमी जेवते. दोन फुलके आणि जरासा भात. मग उपवास कशाला?’’ श्वेता सत्यच बोलत होती. पण आकाश नाराज झाला. त्याने हळूहळू श्वेताशी अबोला धरला. लैंगिक असहकार करून पाहिला. श्वेताला मूड यायचा तेव्हा ‘आज दमलोय, नको’ म्हणत आकाश प्रणयाला नकार द्यायचा. असं वारंवार होऊ लागलं.

‘‘तुमचा माझ्यातला इंटरेस्ट कसा काय संपला? व्हॉट इज युवर प्रॉब्लेम?’’ असं श्वेताने आकाशला एके दिवशी विचारलं. त्याचं उघडं, पीळदार शरीर रात्री बेडरूममध्ये पाहिल्यावर तिच्या मनात स्वाभाविकच शरीरसुखाची इच्छा प्रबळ झाली. आकाश स्पष्टपणे म्हणाला, ‘‘तू देव मानायला लाग. आईला खूश कर. नंतरच आपण आपल्या सुखाचं बघू…

‘‘माझा देवावर विश्वास नाही, हे लग्नाआधी मी तुला स्पष्ट सांगितलं होतं. गोरेगावच्या बागेत आपण फिरायला गेलो होतो. आठवतंय का तुला?’’

‘‘मला वाटलं तू बदलशील…’’

‘‘अशी कशी बदलेन? मी काही रागाने, भावनेच्या भरात नास्तिक झालेले नाही. अभ्यास आहे माझा…’’ हे बोलताना श्वेता वालावलकर सरांचं ‘श्रद्धा विसर्जन’ नावाचं पुस्तक चाळत होती.

हळूहळू श्वेताचे आणि सासूचे वादही वाढू लागले. खटके उडायचे. श्वेता सासूच्या सोबतीला देवळापर्यंत जायची खरी, पण बाहेरच थांबायची. त्यावरुन भांडण झालं. सासू म्हणाली, ‘‘बाहेर चपला सांभाळायला थांबतेस का? आत आलीस तर काय झिजशील?’’ श्वेता पटकन बोलून गेली, ‘‘मला शहाणपणा शिकवू नका. तुमचं काय ते तुमच्यापुरतं ठेवा.’’ सासू घरी आल्यावर रडू लागली. ‘‘मला उभ्या जन्मात असं कुणी बोललं नव्हतं. देव बघून घेईल तुला,’’ असं बोलत सासूने सुशिक्षित सुनेला जणू शत्रूच ठरवलं.

संध्याकाळी आकाश आल्यावर श्वेता म्हणाली, ‘‘मी माहेरी जातेय. मला बोलवायला येऊ नका. मला वाटलं तर मी येईन. पण नक्की नाही. माहेरीच जातेय मी विरारला. कुठे पळून जात नाही, नाहीतर उठवाल काहीतरी खोटी आवई.’’

आकाश तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या या करारीपणाची त्याला थोडी भीतिच वाटली. श्वेता आपल्या श्रीमंत वडिलांकडे जाऊन राहिली. तिच्या मम्मीला ते खटकलं. पण श्वेता म्हणाली, ‘‘थांब गं तू. आकाशला माझ्याशिवाय करमायचं नाही.’’ तसंच झालं. पंधरावीस दिवस उलटल्यावर त्याचा फोन येऊ लागला.

श्वेता नवऱ्याचा फोन कट करायची. मग त्याने एसएमएस केला, ‘तुझ्याशी बोलायचं आहे. विरारला येऊ का?’ श्वेताच्या मनातही तेच होतं. तिने होकार दिला.

आकाशनं नमतं घेतलं. श्वेता म्हणाली. ‘‘तुम्हाला देव मानण्यापासून मी कधी रोखलं का? तुम्ही जरूर पूजा, प्रार्थना काय ते करा. पण माझ्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणू नका. तुमच्या आईला समजावणं तुमचं काम आहे. तुम्ही म्हणता म्हणून मी येतेय. पण परत  अपमान झाला तर कायमची सोडेन सासर…’’ नास्तिकतेचं स्वातंत्र्य श्वेताने असं मिळवलं.

आता घरातली बाकीची मंडळी रुढी, कर्मकांड सारं सांभाळतात. पण श्वेता मात्र, ‘निरीश्वरवाद’ जपते. त्यांना झालेलं बाळ मोठेपणी श्वेताच्या वळणावर जाणार की आकाशच्या ते आता कशाला बोला, हे तर येणारा काळ ठरवेल…हो ना?

संकर्षण

कथा * मीरा सिन्हा

गगन यांचा बालपणापासूनचा मित्र. आम्ही त्याच्या घरातून बाहेर पडल्यापासून माझा नवरा आशीष पुन्ह:पुन्हा म्हणत होता, ‘‘मला समजंतच नाहीए, संकर्षण किती गगनसारखा दिसतो, बोलतो, वागतोसुद्धा. जणू तो त्याचाच मुलगा असावा…नाक आहे तुझ्यासारखं, पण माझं तर त्याच्यात अगदीच काही जाणवंत नाही.’’

मी म्हटलं, ‘‘नाही कसं? तो तुमच्यासारखाच कुशाग्र बुद्धीचा आहे अन् थोडा संतापीसुद्धा…गगनभाऊ अगदीच शांत वृत्तीचे आहेत.’’

‘‘हो पण, आपला मुलगा म्हटल्यावर तो थोडा तरी माझ्यासारखा दिसायला हवा ना?’’

‘‘तुम्हाला सांगू का? माणसाचं व्यक्तिमत्त्व घडतं ते घरातल्या वातावरणामधून, घरातल्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातून. जन्मल्याबरोबर मी त्याला श्रुतीच्या ओटीत घातला. त्या क्षणापासून तो त्यांच्या घरात, त्यांच्या संगतीत वाढतोय…त्याच्यावर त्याच घरातले, त्याच वातावरणातले संस्कार झालेत. दुसरं म्हणजे अपघातानं तो आपल्या कुटुंबात येऊ घातला होता. पण माझ्या मनांत आलं, श्रुतीला बाळ होऊ शकत नाही, तेव्हा हे बाळ मी माझ्या पोटात वाढवून श्रुतीच्या ओटीत टाकेन. तिलाही आई होण्याचं सुख मिळेल. माझ्या मनांत सतत श्रुती अन् गगन भाऊंचेच विचार असल्यामुळेही कदाचित तो आपल्यापेक्षा वेगळा झाला असेल…’’ मी म्हटलं.

‘‘हो…तेही खरंच, पण सीमा तू खरोखरंच महान आहेस हं! आपलं बाळ असं निर्लेज मनानं दुसऱ्याला देणं सोपं नाही.’’

‘‘खरंच, पण तुम्हाला सांगू का? श्रुती वहिनी अन् गगनभाऊंचं दु:ख मला बघवंत नव्हतं. तुम्ही त्यावेळी इथं नव्हता. पण श्रुतीला झालेलं ते भयंकर बाळ त्याचा मृत्यू…ते सगळं फारच भयंकर होतं. मी ते बघितलंय, अनुभवलंय श्रुतीची परिस्थिती बघून तर जीव इतका कळवळायचा…अन् त्या दोघांनी आपल्यासाठी खूप केलंय…त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो याचं फार समाधान आहे.’’

‘‘हो, हे मात्र खरं, गगन अन् वहिनी कधी परके वाटलेच नाहीत. पण तरीही आपलं बाळ दुसऱ्याला देणं इतकं सोपं नसतं. मला तर वाटत होतं की ते बाळ आपण परत आपल्याकडे आणूयात.’’

‘‘छे: छे:, भलतंच काय बोलता? श्रुती अन् गगनभाऊंचा मनांचा विचार करा. त्यांचं तर सर्व आयुष्य त्या बाळाभोवती फिरतंय. एक क्षण त्याच्या वाचून ती दोघं राहू शकत नाहीत.’’

‘‘होय, तेही खरंच अन् संकर्षणला आपण त्याचे आईबाप आहोत हे कुठं ठाऊक आहे. तो त्यांनाच आपले आईबाबा मानतोय.’’ आशीषनं म्हटलं.

देवाची कृपा म्हणायची की माझ्या नवऱ्याला काही संशय आला नाही. मी तर मनांतून खूपच घाबरले होते की आशीषला कळंतय की काय की संकर्षणचे वडील तो नाही, गगनच आहे म्हणून. आमच्या सतरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मी ही एकमेव गोष्ट नवऱ्यापासून लपवली होती अन् आहे. हे रहस्य लपवून मी इतकी वर्षं आशीषबरोबर संसार करतेय. आम्ही व्यभिचार केला नाही. माझ्यावर बळजबरी झाली नाही…परिस्थितीच अशी होती की मी व गगन एकत्र आलो व संकर्षणचा गर्भ माझ्या पोटात रूजला. मात्र हे रहस्य आम्ही दोघांनी प्राणपणानं जपलं म्हणूनच दोन आनंदी संसार आजही सुखानं आयुष्य जगताहेत.

गगन यांचा लहानपणापासूनचा मित्र. गगन हडकुला, शांत, अभ्यासात बेतासबात तर आशीष अंगपिडानं सुदृढ, थोडा संतापी अन् विलक्षण हुषार. दोघांच्या घरची परिस्थितीही खूपच भिन्न. गगन अगदी गरीब कुटुंबातला तर आशीष उच्च मध्यम वर्गीय. पण इतका फरक असूनही या दोघांची मैत्री कुणीही हेवा करावा अशी होती. गगनला कुणी काही वेडंवाकडं बोलून गेला तर आशीष त्याला असा धडा शिकवायचा की दुसरा कुणी गगनला त्रास देण्याचा विचारही मनांत आणणार नाही. आशीषचं प्रत्येक वाक्य गगनसाठी वेद वाक्य होतं. त्याच्या शब्दाबाहेर तो कधी जात नसे.

कालचक्र फिरत होतं. आशीषची निवड आयएएसाठी झाली. गगननं छोटासा व्यवसाय सुरू केला. त्याला त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी आर्थिक पाठबळ दिलं. आशीष शिकत असतानांच सासूबाईचं निधन झालं होतं. त्यावेळी गगनच्या आईनं आशीषला आईची उणीव भासू दिली नव्हती. माझे सासरे तर म्हणायची त्यांना दोन मुलगे आहेत. आशीष आणि गगन.

सुर्दैवानं दोघांची लग्नंही मागेपुढे झाली अन् मी आणि श्रुती या कुटुंबात दाखल झालो. दुधात साखर विरघळावी तशा आम्ही दोघी या दोन पण एकत्र कुटुंबात रमलो. श्रुतीचं अन् माझं छान पटायचं. आम्हा चौघांची ती निखळ, निर्मळ मैत्री अन् परस्परांवरील विश्वास आणि माया बघून सगळ्यांना नवल वाटायचं.

माझ्या आणि श्रुतीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत खूप फरक होता. तरीही आम्ही चौघं अभिन्न मित्र होतो. आशीषच्या अनेक ठिकाणी बदल्या व्हायच्या. मला त्यांच्यासोबत जावं लागायचं. माझे सासरे त्यांचं गाव, त्यांचं घर सोडून रहायला नाखूष असायचे. थोडे दिवस ते आमच्याकडे येऊन राहत असत. पण एरवी ते घरीच रहायला बघत. अशावेळी श्रुती आणि गगन त्यांची काळजी घेत होते. आम्ही दोघं नाही अशी जाणीवही ते माझ्या सासऱ्यांना होऊ देत नव्हते.

आम्हाला दोन मुलं झाली पण श्रुतीला अजून मूल झालं नव्हतं. तिला दिवस रहायचे पण गर्भपात व्हायचा. डॉक्टरांच्या मते तिचं गर्भाशय गर्भ वाढवून, पोसून पूर्ण वाढीचं मूल जन्माला घालण्याएवढं सक्षम नव्हतं. दर गर्भापातानंतर दोघंही इतके हिरमुसून जात की आम्हालाही वाईट वाटायचं. गर्भपात अन् मानसिक धक्का, डिप्रेशन यामुळे श्रुतीची तर तब्येत खूपच खालावली होती. डॉक्टर म्हणाले, ‘‘स्वत:च्या मुलाचा नाद सोडा, मूल दत्तक घ्या किंवा सरोगेशनचा मार्ग निवडा.’’ पण दोन्ही उपाय दोघा नवरा बायकोला मान्य नव्हते.

गगन म्हणायचा, ‘‘मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय, तर श्रुतीला बाळ का होणार नाही. इथल्या डॉक्टरांना कदाचित तेवढं ज्ञान नसेल. मी देशातल्या सर्वात मोठ्या गायनॅकोलजिस्टला दाखवेन. त्यांच्या उपचारानं श्रुतीला नक्कीच बाळ होईल.’’

खरंच गगननं दिल्लीतल्या नामंकित डॉक्टकडे श्रुतीला दाखवलं. त्यांनी म्हटलं, ‘‘थोडा वेळ लागेल, पण आपण प्रयत्न करू. नेमकं याच वेळी आशीषला डेप्युटेशनवर तीन वर्षांसाठी लंडनला जावं लागलं, सासरे बरेच आजारी होते. मुलांना एकदम शाळेतून काढता येत नव्हतं. त्यामुळे मी घरीच होते. आशीष एकटेच लंडनला गेले. श्रुती मला आग्रह करत होती की ती सासऱ्यांची काळजी घेईल, मीही लंडनला जावं, पण मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न होताच.’’

आशीष लंडनला गेल्यावर काही दिवसांतच सासरे वारले. आशीष जेमतेम अत्यंसंस्कारां पुरता येऊन गेला. त्याचवेळी श्रुतीला पुन्हा दिवस गेले. डॉक्टरांनी खूप जपायला सांगितलं होतं. संपूर्ण बेड रेस्ट घ्यायची होती. गगन, त्याची आई अन् मी सर्वत्तोपरी श्रुतीची काळजी घेत होतो.

गर्भातल्या बाळाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सोनोग्राफी, अल्ट्रासाउंड वगैरे टेस्टही करू नका म्हणून सांगितलं होते. श्रुतीच्या पोटात बाळ वाढत होतं. नऊ महिने पूर्ण झाले. आम्ही सगळेच खूप उत्सुकतेनं बाळाच्या आगमनाची वाट बघत होतो.

श्रुतीला कळा सुरू झाल्या. सगळं नॉर्मल आहे असंच वाटत होतं. मीही माझ्या मुलांना एका नातलगांकडे पोहोचवून श्रुतीजवळच थांबले होते. पण श्रुती कळा देऊन थकली तरी बाळ बाहेर येईना. पाच दिवस डॉक्टरांनी वाट बघून शेवटी सिझेरियनचा निर्णय घेतला. ऑपरेशन करून जे बाळ जन्मला आलं ते अगदी भयानक होतं. त्याला दोन  डोकी, तीन हात होते. त्यानं इतक्या मोठ्यानं टाहो फोडला की तिथल्या नर्सेस घाबरून पळून गेल्या.

डॉक्टरही चकित झाले, गांगरले…आम्ही तर सुन्न झालो होतो. सुर्दैवानं ते मूल अर्ध्या तासातच गेलं. श्रुती बेशुद्ध होती. गगनच्या आईला मी धरून बसले होते. त्या एकदम खचल्या होत्या.

गगन बाळाचा दफनविधी आटोपून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. तो इतका थकलेला, असहाय आणि दयनीय दिसत होता की त्याला बघून माझ्या डोळ्यात अश्रूच आले.

गगनची अवस्था पाहून त्याची आई एकदम सावरली. गगनला तिनं पोटाशी धरलं…धीर दिला. मला म्हणाली, ‘‘सीमा, तू गगनला घेऊन घरी जा. त्याला या क्षणी निवांतपणा अन् विश्रांती हवीय. मी इथं श्रुतीजवळ थांबते. इतका त्रास सहन केला पोरीनं पण देवानं तिला सुख दिलं नाही…’’ त्यांनी डोळ्याला पदर लावला.

मी त्यांनी थोपटून शांत केलं. तोवर गगन बाहेर व्हरांड्यात जाऊन उभा राहिला होता. मी लगेच त्याच्याकडे गेले. हॉस्पिटलच्या बाहेरच रिक्शा उभ्या होत्या. आम्ही रिक्शानं घरी पोहोचलो.

घरात गेल्यावर मी गगनच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी गगनच्या भावनांचा बांध फुटला अन् तो धो धो रडू लागला. त्याची मन:स्थिती मला समजत होती. नऊ महिने श्रुतीची काळजी घेतली. कुठेही हयगय केली नाही…किती ताण असेल मनांवर अन् ती शुद्धीवर आल्यावर आता तिला काय सांगायचं हा पण ताण…

‘‘श्रुतीला हा धक्का सहन होईल का? मी काय करू? कसा तिला सामोरा जाऊ? मीच अभागी आहे…’’ त्याचं रडणं, त्याची विकलता, त्याचं ते मोडून पडणं मलाही बघवत नव्हतं. त्याला कसं शांत करू तेच समजत नव्हतं. शब्द नव्हते बोलायला…मी त्याला जवळ घेऊन थोपटंत होते. रडण्याच्या आवेगात गगननं मला गच्च मिठी मारली. एकमेकांच्या बाहुपाषानं आम्ही झोपी गेलो. मी ही मनानं आणि शरीरानं गेल्या काही दिवसात खूप दमले होते. त्या क्षणांत अगदी नकळत पुरूष अन् प्रकृती, नर आणि मादीचं मिलन झालं. ते वासनांचं तांडव नव्हतं, तो व्यभिचार नव्हता. ती जोडीदाराची फसवणूकही नव्हती. जे घडलं ते जरी समर्थनीय नव्हतं तरी दुर्दैवाच्या रट्यानं खचलेल्या, भंगलेल्या देहमनाला आधार देताना घडलेली एक नैसर्गिक घटना होती. भानावर आल्यावर आम्ही दोघंही ओशाळलो…पण तो विषय तिथंच संपला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गगन श्रुतीला घेऊन कुठल्याशा रम्य ठिकाणी काही दिवस राहणार होता. त्याची आई तिच्या भावाकडे हवापालट म्हणून गेली होती अन् अचानक आशीष लंडनहून परत आले. त्यांना तिथं खूप छान नोकरी मिळाली होती. सरकारी नोकरीचा राजिनामा सहजच मंजूर झाला होता. मुलांच्या शाळांचाही प्रश्न सुटला होता. आता आम्हाला न्यायलाच ते आले होते. मला खरं तर परदेशात जायची इच्छा नव्हती पण आशीषला तिथलं वातावरण, मिळणारा भरपूर पैसा, श्रीमंती या सगळ्याची भुरळ पडली होती. आशीष आल्यावर इतक्या दिवसांच्या विरहाचं उट्टं त्यांनी काढलंच. खूप दिवसांनी त्यांचा सहवास मलाही सुखवंत होता अन् माझ्या लक्षात आलं…माझी मासिक पाळी चुकली आहे…

आशीषला कळलं तर तो आश्चर्यानं म्हणाला, ‘‘अगं, पण इतकी काळजी घेत होतो आपण…तरीही…?’’

त्याच्या डोळ्यात बघत मी म्हटलं, ‘‘उपासाचं उट्टं काढत होता तुम्ही…तेव्हा कदाचित…’’

त्यांनी भुवया अन् खांदे उचकले.

मला मनांतून खात्री होती हे बाळ गगनचं आहे. पण मी म्हटलं, ‘‘आता काय करायचं?’’

किंचित विचार करून आशीषनं म्हटलं, ‘‘अॅबोरशन करून घ्यावं. नव्या ठिकाणी मुलांना, स्वत:ला सेटल करताना तुला खूप अडचण येईल…आता आपल्याला बाळ तसंही नकोय…’’

मीही विचार करत होते. काही वेळानंतर मी म्हटलं, ‘‘श्रुतीला यापुढे मूल होणार नाही. ती खूप डिप्रेशनमध्ये आहे. बाळाचं आगमन तिचं डिप्रेशन दूर करेल असं मानसोपचारवाले डॉक्टर सांगातहेत. आपण हे बाळ तिला दिलं तर?’’

‘‘तुला वेड लागलंय का? आपलं मूल दुसऱ्याला कसं देता येईल?’’

‘‘काय हरकत आहे? श्रुती अन् गगन आपल्याला परके नाहीत…तसंही हे मूल आपल्याला नकोय, तुम्हीच म्हणालात अॅबॉरशन करून घे म्हणून…मग जर हे बाळ जन्माला घालून त्या दोघांच्या ओटीत घातलं तर बालहत्त्येचं पातक नको शिवाय श्रुती, गगन, त्याची आई…सगळ्यांनाच किती आनंद होईल विचार करा. मला नऊ महिने गर्भभार वहावा लागेल…प्रसुती वेदना सोसाव्या लागतील पण श्रुतीसाठी, काकींसाठी आणि गगनभाऊंसाठी मी ते करायला तयार आहे.’’

‘‘पण गगन अन् श्रुतीला ते मान्य होईल का?’’

‘‘विचारून बघू, मग निर्णय घेऊ…’’

आम्ही जेव्हा श्रुतीला व गगनला, काकींना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांचा विश्वास बसेना.

‘‘असं कसं होईल?’’ गगननं म्हटलं.

‘‘तू तुझं बाळ मला देशील?’’ श्रुतीचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

‘‘असं समज की तुझंच बाळ आहे फक्त माझ्या गर्भात वाढतयं. देवकीचा बलराम जसा रोहिणीच्या गर्भात वाढला तसा. पुराणात या विधीला संकर्षण नाव दिलंय. हे बाळ जर मुलगा झाला तर त्याचं नांव संकर्षण ठेवा. तुमच्या मायेत तो मोठा होईल. तुम्हाला आईबाबा म्हणेल…तो तुमचाच मुलगा ठरेल.’’ मी श्रुतीच्या पाठीवर हात ठेवून तिला समजावलं.

आपल्या घरात बाळ येणार या कल्पनेनंच श्रुतीचे डोळे आनंदानं चमकले.

‘‘खरंच? वहिनी. खरंच तुमचं बाळ तुम्ही मला द्याल?’’

‘‘अगदी खरं, तुम्ही आम्हाला परके आहात का? असं समज, तुझं बाळ मी फक्त माझ्या पोटात सांभाळते आहे, वाढवते आहे…जन्माला आलं की तुझं बाळ तुझ्या ओटीत टाकून मी लंडनला निघून जाईन…’’ मी श्रुतीला खात्री दिली. तिनं आनंदानं मला मिठीच मारली. ते दृष्य बघून आशीषही गहिवरले.

लहानपणापासूनची गगनची मैत्री, त्यानं, त्याच्या आईनं आशीषसाठी व त्याच्या बाबांसाठी केलेली मदत, घेतलेले कष्ट हे सगळं आशीषनाही कळंत होतं. त्यामुळे आपण जर त्याच्या उपयोगी पडू शकतोय तर हे एक महान कार्य उरकल्यानंतरच मी लडंनला यावं हे त्यानं मान्य केलं. आमच्या मुलांचंही हे शैक्षणिक वर्ष इथंच पार पडेल याचा मलाही आनंद झाला.

दिवस भराभर उलटत असतात. बघता बघता माझे गरोदरपणाचे नऊ महिने पूर्ण झाले. नॉर्मल बाळंतपण झालं. मुलगा झाला. मी हॉस्पिटलमधून घरी जाताना बाळ श्रुतीच्या ओटीत घातलं. आशीष आम्हाला घ्यायला आले होते.

इथलं घर बंद करून मुलांना घेऊन मी लंडनला गेले. हळूहळू तिथल्या वातावरणात मुलं अन् मीही रूळले. अधूनमधून फोनवर भारतात गगन श्रुतीशी बोलणं व्हायचं. बाळाचं नाव त्यांनी संकर्षण ठेवलं होतं. श्रुतीची तब्येत एकदम ठणठणीत झाली होती. बाळाच्या येण्यानं ती मानसिक व शारीरिक दृष्टीनंही एकदम छान झाली होती. सासूच्या मदतीनं बाळाचं संगोपन उत्तम रितीनं करत होती. घरात आनंदीआनंद होता.

त्यानंतर अनेकदा काही दिवसांसाठी भारतात येणं व्हायचं पण गावी जाणं होत नसे. आई वडिलांना भेटून मी पुन्हा लंडनला यायची. मनांतून भीती वाटायची त्या बाळाला बघून माझ्यातली आई, आईची माया उचंबळून येईल का? कधी कधी वाटायचं नऊ महिने पोटात सांभाळलं ते बाळ आपण का देऊन टाकलं? पुन्हा वाटायचं, बरंच झालं गगनचं मूल गगनकडे वाढतंय…माझ्या डोळ्यासमोर सतत असतं तर कदाचित अपराधीपणाची भावना मन कुरतडंत राहिली असती.

आशीषला यातलं काहीच माहित नव्हतं. ते त्या मुलाचे वडील नाहीत हे ठाऊक नसल्यामुळे, म्हणजेच ते मूल आपलं आहे तेव्हा आपण त्याला भेटूयात असं त्याला सतत वाटयचं. म्हणूनच आम्ही यावेळी आवर्जून गगनकडे भेटायला आलो होतो. संकर्षणला बघितल्यावर मला तर भीतीच वाटली होती की आशीषला काही शंका तर येणार नाही? तसं जर झालं तर श्रुतीचं काय होईल? श्रुतीचं काय होईल? श्रुतीचा संसार उद्ध्वस्त होईलच माझा ही संसार उद्ध्वस्त होईल.

पण आशीषचा माझ्यावर आणि गगनवरही अतूट विश्वास असल्यानंच तो विषय तिथेच थांबला. आजतागायत मी आशीषशी काय, कुणाशीच कधी खोटं बोलले नाही…यापुढेही बोलणार नाही. खरंच सांगते मी आणि गगन निर्दोष आहोत. आम्ही विश्वासघात केला नाही किंवा व्यभिचार केला नाही…तो बलात्कारदेखील नव्हता. उद्ध्वस्त मन अन् थकलेल्या देहाला त्याक्षणी फक्त आधार हवा होता. भावनिक, मानसिक आधार नकळंत दैहिक झाला…तेवढीच चूक…पण त्यामुळे श्रुतीला केवढा मोठा दिलासा मिळाला. तिची मातृत्त्वाची आस पूर्ण झाली. त्यांचं आयुष्य उजळून निघालं अन् आता हे रहस्य कधीच कुणाला कळणार नाहीए.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें