काट्यानं काटा निघाला

कथा * दीपा थोरात

‘‘ऐकतेस ना? ती पॉलिसीवाली ब्रीफकेस जरा आणून दे ना रीमा…’’ बैठकीच्याखोलीतून विवेकनं हाक मारली.

रीमा ओले हात पुसत पुसत बाहेर आली, ‘‘मला आत नीट ऐकायला आलं नाही, काय म्हणताय?’’

‘‘अगं, ती विम्याच्या फायलींची सूटकेस हवी आहे.’’ विवेक म्हणाला. तेवढ्यात आतून कुकरच्या दोन शिट्या पाठोपाठ ऐकायला आल्या. ‘‘बघ, बघ, तुला तुझा मित्र बोलावतोय…शिट्या वाजवतोय…’’ विवेकनं हसून मस्करी केली.

‘‘भलत्या वेळी कसली चेष्टा? माझं कामं संपेनात अन् तुम्ही मध्येच हाक मारता.’’

‘‘अगं, हे कामही महत्त्वाचंच आहे. पॉलीसी मॅच्युअर झाली की क्लेम करता येईल.’’

‘‘खरंच? मग कुठं तरी फिरायला जाऊयात का?’’ खूपच उत्सुकतेनं रीमानं विचारलं.

‘‘आणि ऋचालीच्या लग्नाचं काय?’’ विवेकनं विचारलं.

‘‘अजून लहान आहे ती. दोन तीन वर्षं तरी अजून तिचं लग्न नाही करणार.’’

‘‘पण त्यानंतर तरी कोणती लॉटरी लागणार आहे? हाच पैसा तिच्या लग्नासाठी जपून ठेवावा लागेल. लगेच पुढे दोन तीन वर्षांत लेकाचंही लग्न करावंच लागेल ना? आता पोरांची लग्नं की आपला दुसरा हनीमून तूच ठरव.’’ ब्रीफकेस उघडून फायलींमधले कागद बघत विवेकनं म्हटलं.

रीमा काही न बोलता आपल्या कामाला लागली. खरंच दिवस किती भराभर संपतात, वर्षांमागून वर्षं सरतात. रीमाच्या लग्नाला पंचवीस वर्षं झालीत. लग्न झालं तेव्हा ती फक्त एकोणीस वर्षांची होती. साखरपुडा ते लग्न यात सहा महिने वेळ होता. लग्नाला होकार द्यावा की नकार हेच तिला ठरवता येत नव्हतं. विवेकचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, त्याची चांगली नोकरी भुरळ घालत होती. पण तिचं आत्तापर्यंतचं आयुष्य लखनौसारख्या शहरात, चांगल्या वस्तीत, मोकळ्या वातावरणात गेलं होतं. लग्नानंतर तिला कानपूरपासून बऱ्याच आत असलेल्या एका छोट्याशा गावात, जुनाट वळणाच्या घरातल्या एकत्र कुटुंबात राहावं लागणार होतं. ते तिला पचनी पडत नव्हतं. स्वप्नं सोनेरी होतं. पण त्यावर विद्रुप डागही होते.

शेवटी एकदाची लग्न होऊन ती सासरी आली. अजून तिचं पदवीचं एक वर्ष शिल्लक होतं. इथल्या त्या कोंदट वातावरणात तिचा जीव घाबरा व्हायचा. तिनं विवेककडे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली. या निमित्तानं तिला माहेरी जायला मिळायचं. डिग्री पूर्ण झाली मग तिनं कॉम्प्युटरचा डिप्लोमाही करून टाकला. विवेक तिला भरपूर पाठिंबा देत होता. बालवाडीचाही एक कोर्स तिनं तेवढ्यात उरकून घेतला. लग्नाला पाच वर्षं झाली तोवर पदवी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, बालवाडीचं सर्टिफिकेट अन् ऋचा अन् रोहन अशी दोन बाळं तिच्या पदरात होती. सासरच्या घरात सासू, सासरे, दोघं दीर, दोन जावा, त्यांची चार मुलं अन् एक सतत घरात असणारी मोलकरीण अशी चौदा माणसं होती. घर एकत्र होतं. स्वयंपाक एकत्रच असायचा. शेतातून धान्य, भाज्या मिळायच्या. वरकड खर्चाला सासऱ्यांची पेंशन अन् तिन्ही भावांकडून आईला दर महिन्याला खर्चाची रक्कम मिळायची. दोन्ही जावांचं कामावरून भांडण व्हायचं. रीमा न बोलता चटचट कामं उरकायची. तिचं सुंदर रूप, कामाचा उरक, शिक्षण, येणाऱ्यांशी चांगलं वागणं, बोलणं यामुळे थोडक्या काळात ती सर्वांची लाडकी झाली होती. पण तिच्या एकूणच बुद्धिनं, रूपानं सुमार असलेल्या जावा तिचा सतत दुस्वास करायच्या. त्या दोघी कायम एक असायच्या. पण रीमा हसून साऱ्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. दरम्यानच्या काळात विवेकला दिल्लीला नोकरी लागली. रीमाला वाटलं, बरं झालं, या जंजाळातून मुक्ती मिळाली. पण विवेकनं तिला दिल्लीला घर करणं आता जमणार नाही हे समजावून सांगितलं. तिनंही ते समजून घेतलं.

विवेक औषधांच्या कंपनीत एरिया मॅनेजर होता. रीमाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या गावात हल्ली बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. तालुक्याचा दर्जा गावाला मिळाला होता. नवीन शाळाही उघडली होती. दोन्ही मुलांचे एडमिशन्स तिथं झाले अन् रीमालाही तिथं कॉम्प्युटर टीचर म्हणून नोकरी मिळाली. विवेकनं तिला आईवडिलांकडून नोकरीची परवानगी मिळवून दिली. दोन्ही जावांचा जळफळाट झाला. त्यांनी सासूचे कान भरायचा प्रयत्न केला. पण सासूला दोन्ही वेळा वेळेवर चहा अन् जेवण मिळण्याशी काम होतं. त्या वेळा रीमानं कधीच चुकवल्या नाहीत. पण घरातल्या एकूण वातावरणात तिचा जीव गुदमरायचा. अशात छोटूचं विनोदी बोलणं, त्याची तत्पर मदत यामुळे तिला ताज्या वाऱ्याची झुळुक मिळाल्याचा भास व्हायचा.

नाव छोटू असलं तरी तो लहान नव्हता. चांगला उंचबिंच लांबरूंद तरूण होता. त्याच्या बलवीर या नावानं त्याला कधीच कुणी हाक मारली नाही. अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं. कसा बसा मॅट्रिक झाला अन् मग समाज सेवेतच गुंतला. कुणाला इस्पितळात पोहोचव, कुणाचा गॅस सिलिंडर आणून दे, लग्नकार्यात स्वत: उभं राहून मांडव घालून दे, वांजत्रीवाला ठरवून दे अशी घरातली बाहेरची कामं सतत करायचा. घरची कार सतत तो दामटायचा. थोरले दोघं भाऊ कार चालवायला शिकलेच नाहीत. हक्काचा छोटू हाताशी होताच. छोटू त्याच्या आईवडिलांना उतार वयात झालेला. त्यामुळे त्यांचा छोटूवर फार जीव अन् आईबापांची संपत्ती आपलीच आहे हे छोटूनं ठरवूनच टाकलं होतं.

बोलणं वागणं अगदी नम्र होतं छोटूचं. हात जोडून उभा राहिला की समोरच्याला भरूनच यायचं. रीमाच्या सासऱ्यांच्या बॉसचा तो मुलगा. त्यांचाही छोटूवर जीव होता. दिवसभरात एक दोन फेऱ्या त्याच्या सहजच व्हायच्या.

रीमाला म्हणायचा, ‘‘वहिनी, तुमचं माझं वय जवळजवळ सारखंच असेल पण तुम्ही कधी रिकाम्या नसता अन् मी कायम रिकामाच असतो.’’

‘‘तर मग कर ना काही काम. निदान शाळेत जा. अकरावी, बारावी करून टाक.’’

‘‘नाही जमणार मला.’’

‘‘कॉम्प्युटरचा कोर्स कर. चांगली नोकरी मिळेल.’’

‘‘बरं बघतो. पण वहिनी तुम्ही खरंच खूप स्वीट आहात.’’

रीमाला हसायला आलं.

‘‘तुम्हाला ठाऊक आहे का? तुमचं हसणं वेड लावतं मला. तुम्हाला हसताना बघितलं की चेहऱ्यावरून नजर हलत नाही. मला तर विवेकदादाचा हेवाच वाटतो.’’

‘‘असं काही तरी बोलू नकोस.’’ रीमा रागावून म्हणाली.

‘‘खरंच सांगतोय मी. तुमचे डोळे. तुमचं हसणं एकदा कुणी बघेल, ऐकेल तर जन्मभर विसरणार नाही.’’

‘‘तू आता निघ अन् काहीतरी अभ्यास सुरू करशील तेव्हाच भेटायला ये.’’ रीमा त्याला हाकलायला बघत होती.

‘‘तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटतेय? मी खरं सांगतो. काय सुंदर फिगर आहे तुमची. दोन मुलांची आई तर वाटतंच नाही तुम्ही. लोकांना अजूनही वाटतंय तुम्ही लग्नाची मुलगी आहात म्हणून!’’

‘‘आता पुरे. तू निघ. मला संताप अनावर होईल असं काही बोलूही नकोस.’’ पटकन् तोडून टाकत रीमानं म्हटलं अन् ती सरळ आपल्या खोलीत निघून आली.

स्वत:च्या खोलीतल्या डे्सिंग टेबलसमोर उभी राहून तिनं आपल्या प्रतिबिंबाकडे बघितलं. ती खरोखर सुंदरच होती. लग्न झालं नसतं तर इतर मैत्रिणींप्रमाणे युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजातच पीएचडी करत असती. पण कॉलेजचं आयुष्य फारच लवकर संपलं. संसाराच्या रामरगाड्यात कसंबसं शिक्षण पूर्ण करू शकली. एक मात्र खरं की नवरा सतत तिच्या पाठीशी होता. त्यानं तिच्या शिक्षणाला प्रतिबंध केला नाही. संसार, मुलं सांभाळून अभ्यास करणं, परीक्षा देणं सोपं नक्कीच नव्हतं. पण ते तिनं जिद्दीनं केलं.

जुन्या आठवणी कशाला अन् किती काढायच्या म्हणत ती आरशासमोरून बाजूला झाली. पण मन मात्र भूतकाळातून बाहेर यायला तयार नव्हतं.

तिच्या माहेरी चुलत बहिणीचं लग्न होतं. विवेकपाशी खूप हट्ट करून त्याच्यासह ती मुलांना घेऊन माहेरी आली होती. स्वत:च्या लग्नातही ती ब्युटी पार्लरला गेली नव्हती. यावेळी मात्र नवरीच्या जोडीनं तिनंही सगळे सोपस्कार करून घेतले होते. नटूनथटून ती विवेकसमोर येऊन उभी राहिली, तेव्हा क्षणभर तो बघतच राहिला. मग जरा करडेपणानं म्हणाला, ‘‘इतकं नटायची काय गरज होती? लग्न तुझं नाहीए…’’

‘‘माझ्या बहिणीचं आहे. अन् आईबाबा, बाकीचे कुठं गेले? मुलं…?’’

‘‘सगळे टॅक्सीनं पुढे गेलेत. तुझं नटणं संपेना…घर लॉक करून या म्हणून सांगितलंय…दादाने त्याची बाईक ठेवलीय…आपण बाईकनं जाऊयात.’’ विवेकनं म्हटलं.

‘‘तर मग चला नं लवकर,’’ ती उतावळेपणानं म्हणाली.

‘‘बाइकची किल्ली तर आण. ती वर बेडरूममध्येच आहे.’’

माहेरच्या घरातली रीमाची खोली अजूनही तिच्यासाठीच राखून ठेवलेली असते.

‘‘प्लीज अहो, तुम्हीच आणा ना वरून? हा लेहंगा घालून जिना चढणं, उतरणं फार त्रासदायक होतं.’’ तिनं म्हटलं.

‘‘तर मग बसा घरीच.’’ विवेक म्हणाला.

रागानं रीमा उठली अन् जिना चढून खोलीत आली. पलंगावरच किल्ली होती. किल्ली उचलून ती वळतेय तोवर विवेकनं तिला मिठीत घेतली अन् दोघंही बेडवर कोसळली. विवेकच्या प्रेमाला उधाण आलं होतं.

‘‘अहो असं काय करताय? माझा सगळा मेकअप बिघडला ना? कसंबसं स्वत:ला सोडवून घेत रीमानं म्हटलं, लवकर निघायला हवं. सगळे तिथं वाट बघत असतील?’’

‘‘बघू देत वाट! मला आता धीर निघत नाहीए…’’

‘‘प्लीज, आपण लवकर घरी येऊ…पण आता चला ना?’’

‘‘तू तिथे गेलीस की रमशील आपल्याच लोकांमध्ये,’’ विवेकनं मिठी अधिकच घट्ट केली. एक चुंबन घेतलं.

‘‘प्रॉमिस! लवकर घरी येऊ. पण आता चला.’’ विवेकनं किल्ली घेतली अन् जिना उतरू लागला. पटकन् स्वत:चा अवतार ठिकठाक करून ती ही निघाली.

लग्नाच्या हॉलमध्ये विवेक सतत तिच्याजवळ होता. नातलग मैत्रिणी सर्वांनी किती चेष्टा केली तिची. विवेकला तिच्या नटण्यावर एवढ्यासाठीच आक्षेप होता की तिचं सौंदर्य आणखी कुणी बघावं हे त्याला आवडत नव्हतं. आपण होऊन तो कधी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत नसे, पण त्याचा स्वभाव आता तिला कळला होता.

विवेक नसताना तिला किती उदास वाटतं. ते दुसऱ्याला समजणार नव्हतं. दिवसा घरकाम, मुलं, शाळा या सगळ्यात वेळ जायचा. पण रात्री मात्र फार लांबलचक अन् कंटाळवाण्या वाटायच्या. घरात लॅन्डलाइन फोन होता. विवेकचा फोन बरेचदा सासू, सासरे किंवा दिर उचलायचे. रीमाला कधी तरी बोलायला मिळायचं.

त्या दिवशी मात्र फोन तिनंच उचलला. विवेक म्हणाला तो मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घरी पोहोचतोय. त्यानं तिला अर्ध्या दिवसाची सुट्टी घे म्हणूनही बजावलं. मुलांना रिक्शा करून घरी येऊ दे, हेही सांगितलं. ‘‘दुपारी तू मला हवी आहेस.’’ तो म्हणाला.

‘‘अहो पण रात्री घरीच आहात ना?’’

विवेक एकदम रागावला, ‘‘मग मी सुट्टी कॅन्सल करतो?’’

‘‘बरं बर, मी घेते सुट्टी…रागावू नका,’’ तिनं हॉलमध्ये नजर फिरवली. सुर्दैवानं तिथं कुणी नव्हतं. एक तर फोन अगदी भर चौकात असावा अश्या जागी अन् यांना रोमान्स सुचतोय…

तिनं घरात सकाळीच सांगितलं लंच टाइमपर्यंत विवेक येतोय. शाळेत मंथली टेस्ट चालू होत्या. शाळेत प्रिसिंपलच्या परवानगीनं कॉम्प्युटरचे पेपर्स सकाळीच आटोपून घेतले. घरी एक समारंभ आहे म्हणून हाफ डे घेतेय सांगून वेळ मारू नेली.

ती शाळेच्या गेटपाशी पोहोचतेय तोवर छोटू मोटरसायकल घेऊन समोर आला.

‘‘वहिनी, घरी जायचंय?’’

‘‘चला, मी सोडतो.’’

खरं तर रिक्शा मिळाली असती तर बरं झालं असतं. पण रिक्शा लवकर मिळेलच याची खात्री नाही. उशीर झाला तर पुन्हा विवेक चिडेल.

‘‘कसला विचार करताय वहिनी? आज लवकर कशा काय निघालात?’’

‘‘जरा बरं वाटत नाहीए…’’

‘‘वहिनी, थोडं स्वत:कडेही लक्ष द्या. तुम्ही ना, फारच भोळ्या आहात. दादा तिकडे मजा करतोय अन् तुम्ही मात्र इथं सतत खपताय.’’

‘‘कसली मजा अन् कसलं काय? एकटे राहतात, घरचं जेवण नाही, सतत प्रवास. हे सगळं ते आमच्यासाठीच करताहेत. मुलांच्या भवितव्यालाठीच सगळं चाललंय.’’

‘‘या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. तिथं तर नाइट क्लब, दारू, पोरी सगळंच असतं. कोण बायकोची आठवण काढतंय?’’

तिला वाटलं सांगावं छोटूला की विवेक आताही घरी तिची वाट बघत तळमळतोय. पण ती काही बोलली नाही. घरापाशी मोटर सायकलवरून उतरल्यावर कोरडेपणानंच म्हणाली, ‘‘चहा घेऊन जा.’’

‘‘नको…तुम्हाला बरं नाहीए. पण नंतर येतो. जरा काही कॉम्प्युटरबद्दल विचारायचं आहे.’’

‘‘बराय, पुढल्या पंधरवड्यात ये. आता मुलांच्या टेस्ट चालू आहेत.’’

‘‘तुमची आज्ञा शिरसावंद्य स्वीट वहिनी.’’ झटक्यात बाइक वळवून तो निघून गेला अन् रीमानं सुटकेचा नि:श्वास सोडला.

सासूसासरे व्हरांड्यातच बसलेले होते. ‘‘आज लवकर कशी आलीस? विवेक आलाय म्हणून का? त्याचं जेवणखाणं झालंय..तू काळजी कशाला करतेस?’’ सासूनं म्हटलं.

काही न बोलता खाली मान घालून ती खोलीकडे निघाली. ‘‘अगं तो झोपला असेल, तू आमच्यासाठी चहा कर बरं!’’ सासरे म्हणाले.

खोलीत विवेक उतावीळपणे तिची वाट बघत होता. त्यानं जणू झडपच घातली तिच्यावर. ‘‘किती दिवस झाले तुला भेटून.’’

‘‘फक्त एकच महिना.’’ तिनं हसून म्हटलं. त्याच्या प्रेमवर्षावात ती चिंब भिजली. विवेकनं तृप्त चेहऱ्यानं तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘मी आता झोपणार आहे. तू काय करणार आहेस?’’

‘‘मला आधी जरा तोंड हातपाय धुवून कपडे बदलून घेऊ देत. सासूबाईंना चहा हवा होता. मुलंही येतच असतील. अजून जेवण व्हायचंय माझं…तुम्हाला काय? झोपा आता मुकाट्यानं.’’ तिनं त्याचे केस विस्कटून टाकत हसून म्हटलं.

त्या दिवशी सासूसासऱ्यांशी, दोघी जावांशी अगदी मुलांशीही तिला खोटं बोलावं लागलं होतं.

विवेक रजा संपवून निघून गेला होता. तिनं कपाट आवरायला घेतलं होतं. सुट्टीचा दिवस होता. पुस्तक काखोटीला मारून छोटूनं घरात प्रवेश केला. सरळ तो तिच्या बेडरूममध्येच आला. ती दचकली. सावरून म्हणाली, ‘‘चल बाहेर, व्हरांड्यातच बसूयात.’’

‘‘चालेल ना.’’ पलंगावर बसत तो म्हणाला, ‘‘तुमचा बेड खूपच छान आहे हं! पण एकटीला तुम्हाला यावर झोप येत नसेल ना?’’

काही उत्तर न देता रीमा खोलीबाहेर पडली. मागोमाग छोटूही आला.

‘‘वहिनी, मी मस्करी करत होतो. तुम्ही तर रागावलात.’’

रीमाला जाणवत होतं, विवेक इथं नसताना छोटूची मस्करी मर्यादा ओलांडते. ती जितकी त्याला टाळायला बघते तेवढी त्याच्याकडून मदत घ्यावी लागते. मध्ये ऋचा पायऱ्यांवरून पडली. भरपूर रक्त आलं. छोटूंनच ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन जखमेला टाके घातले. पुढेही दोन दिवस फॉलोअपसाठी त्याच्याच गाडीतून तो रीमाला व तिला नेत होता.

खेळताना मुलाचा पाय मुरगळला. छोटूचीच मदत होती. सासूबाईंचं ब्लडप्रेशर शूट झालं. छोटूनं धावपळ केली. त्याचे उपकार घेतले म्हणताना तिला त्याला तोडूनही टाकता येत नव्हतं.

एक दिवस आला अन् म्हणाला, ‘‘मी हल्ली विमा एजंट झालोय. एक पॉलिसी तर तुम्हाला घ्यावीच लागेल.’’

रीमानं ऋचाच्या नावानं एक पॉलिसी घेतली. कारण घेतली नसती तर तो घरातून हलणार नाही हे तिला ठाऊक होतं.

‘‘याला म्हणतात समजूतदारपणा. यू आर रीयली स्वीट वहिनी.’’ छोटूनं म्हटलं.

‘‘दादा कधी येणार आहेत?’’

‘‘तुला का आठवण येतेय त्यांची?’’ रीमानं रागानं विचारलं.

‘‘तुमचा एकटेपणा बघवत नाहीए मला. हे इतकं तरूण वय काय असं एकट्यानं झुरण्याचं वय आहे का?’’

‘‘असतात काही काळासाठी तसे योग.’’

‘‘पण तुम्ही असं विरक्त का राहायंच…छान मौजमजा करायची.’’

‘‘म्हणजे काय?’’ तिनं मुद्दामच विचारलं.

‘‘वहिनी, तुमच्याकडे तर डबल लायसेन्स आहे.’’

छोटू मर्यादा ओलांडतो आहे हे लक्षात आलंच होतं. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकावा म्हणून तिनं विचारलं, ‘‘मौजमजा करायला लायसेन्स लागतं?’’

‘‘म्हणजे एक तर तुम्ही विवाहित आहात, त्यातून तुमचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशनही झालंय. आता तर मुक्त पक्ष्यांप्रमाणे आकाशात भरारी घ्यायची.’’

‘‘म्हणजे काय? मला काहीच कळलं नाही.’’

‘‘वहिनी, अगं तुझा हा भाबडेपणाचं मला वेड लावतो. अगं, दादा दिल्लीला दुसऱ्या कुणा स्त्रीबरोबर मजा करतो. तसं तूही इथे कुणा दुसऱ्याबरोबर मजा करायची.’’

इतका संताप आला रीमाला, पण तसं न दाखवता तिनं म्हटलं, ‘‘हा तर माझ्या पतीचा विश्वासघात ठरेल.’’

‘‘नाही, अजिबात नाही. हा तर फक्त थोडासा टाइमपास असतो. समजायचं एक सिनेमा बघितला. सिनेमा संपला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी.’’

‘‘अजून लग्न झालं नाहीए तुझं, म्हणूनच तुला या नात्याचं पावित्र्य, त्याच्या मर्यादा, त्याचं महत्त्व कळत नाहीए. तुझं लग्न होऊ दे. मग मी सांगेन तुला की एक सिनेमा तुझ्या बायकोचा विवेकनाही दाखव, मग कसं वाटेल तुला.’’

‘‘मला काही वाटणार नाही. मी संकुचित विचारांचा नाही. मोकळ्या विचारांचा आहे. माझी बायको काय करते यानं मला फरक पडणार नाही.’’ छोटू वरवर बेपर्वाइनं बोलला पण त्याचा चेहरा पडला होता.

रीमानं जणू त्याला आव्हानच दिलं. ‘‘ठिक आहे, तू आपल्या बायकोला खरोखर एवढं स्वातंत्र्य देतोस का? ते मी ही बघेनच! मग कळेल की बोलतो तो खरंच करतो का की फुकटचीच वटवट असते.’’

वर्षभरातच विवेकबरोबर ती कानपूरला गेली. बिऱ्हाड मांडलं. खूप आनंदात होती रीमा, एक दिवस अचानक छोटूचा फोन आला.

‘‘बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची? कसा काय फोन केलास?’’ आश्चर्यानं रीमानं विचारलं.

‘‘काय वहिनी, माझ्या लग्नाला आला नाहीत तुम्ही?’’ जरा नाराजीनं त्यानं म्हटलं.

‘‘तू आम्हाला पत्रिकाच पाठवली नाहीस. तिथल्या घरी दिली असशील. त्यांनी तर लग्न झाल्यावरच आम्हाला कळवलं…असू दे, काही हरकत नाही. तुला अन् तुझ्या वधूला खूप खूप शुभेच्छा…’’

‘‘वहिनी, एक काम होतं, म्हणून फोन केला. माझ्या बायकोला बी.एडसाठी कानपूरच्या कॉलेजात एडमिशन मिळालं आहे. तिला राहाण्यासाठी एखादी जागा बघाल का?’’

‘‘अरे व्वा! ही तर आनंदाची बातमी आहे. घराची काळजी करू नकोस. इथं आमचा थ्री बेडरूम फ्लॅट आहे. दोन आम्ही वापरतो. एक तर बंदच असतो. तुम्ही तिथं राहू शकता. काहीच त्रास होणार नाही. तू तर म्हणालाच होतास ना की तुझी बायको फिल्मपण दाखवेल, तर दादाही इथं आहेत. ते तिची काळजी घेतील. तू येच बायकोला घेऊन.’’

खाट्कन फोन बंद झाला. याचा अर्थ छोटूची बायको त्यांच्याकडे येणार नाही.

रीमाला हसायला आलं. ती तर चेष्टा करत होती अन् छोटू घाबरला होता.

विवेक पाणी पिण्यासाठी आत आला होता. रीमाला हसताना बघून त्यानं विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘काही नाही,…मला एक सांगा, छोटूकडून घेतलेल्या पॉलिसीची मुदत कधी पूर्ण होतेय?’’

‘‘पुढच्याच वर्षी. दोन लाख मिळतील. लेकीच्या लग्नाची सोय झालीय…पण तू का विचारते आहेस?’’

‘‘सहजच! एक तरी काम चांगलं केलं छोटूनं.’’

‘‘त्यानं वाईट काम काय केलं होतं? मला ही कळू देत.’’ विवेकनं म्हटलं.

‘‘त्यानं वाईट काम केलं असं मी कधी म्हटलं.’’

‘‘तुम्हां बायकांशी वाद कुणी घालायचे? जाऊ दे झालं.’’

‘‘हे मात्र बरोबर बोललात.’’ रीमा हसत म्हणाली.

मनात म्हणाली, ‘‘काट्यानं काटा निघाला.’’

अंतरी उजळले दिवे

* सुरेखा सावे

ऑफिसातून घरी परतताना रात्रीचे आठ वाजून गेले होते. घरात शिरताच प्रतिमाचा बिघडलेला मूड श्रवणला जाणवला. कारण एरवी हसून स्वागत करणारी प्रतिमा बरीच काळजीत दिसत होती. दिवसभरातल्या आळीतल्या, घरातल्या सर्व वितंबातम्या आल्या आल्या श्रवणला सांगून मगच ती इतर कामाला लागायची. पण आज तिनं मुकाट्यानं चहाचा कप पुढ्यात ठेवला.

तिची क्षमा मागत श्रवणनं म्हटलं, ‘‘सॉरी, मी तुला फोन करू शकलो नाही…अगं महिन्याच्या शेवटच्या दिवशी ना, काम जरा जास्तच असतं…’’

‘‘तुमच्या कामाची कल्पना आहे मला…पण मला दुसरीच काळजी सतावते आहे…’’ प्रतिमा म्हणाली.

‘‘अरे? आम्हालाही कळू देत काय दु:ख आहे माझ्या चंद्रमुखीला.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘दुपारी मोठ्या वहिनींचा फोन आला होता अमेरिकेहून, उद्या सायंकाळी सासूबाई इथं पोचताहेत…’’

‘‘हात्तिच्या! एवढंच ना? मग त्यात काळजीचं काय कारण आहे? आईचं घर आहे ती केव्हाही येऊ शकते ना?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘तुम्हाला समजत नाहीए. अमेरिकेत राहून त्या खूपच कंटाळल्या. आता त्या इथंच राहायचं म्हणताहेत…’’ प्रतिमा अजूनही काळजीत होती.

‘‘तर मग छानच झालं की! घरात चैतन्य वाढेल. भांडी जास्त आवाज करतील. एकता कपूरच्या सीरियल्सबद्दल तुला चर्चा करायला रसिक श्रोता मिळेल. सासवासुना मिळून आळीतल्या महिला मंडळात धमाल कराल…हा…हा…हा…’’

‘‘तुम्हाला सगळी चेष्टाच वाटतेय. माझ्या जिवाला घोर लागलाय.’’ प्रतिमानं म्हटलं.

‘‘अगं राणी, घोर तर माझ्या जिवाला लागायला हवा. तुम्हा सासूसुनेच्या शीतयुद्धात मीच हुतात्मा होतो. जात्यातल्या धान्यासारखी अवस्था असते माझी. तुला काही म्हणू शकत नाही की आईला काही म्हणू शकत नाही…’’

प्रतिमा गप्पच होती. थोडा वेळ थांबून श्रवणनं म्हटलं, ‘‘तुला एक सुचवू का? पटलं तर बघ, काही टीप्स देतोय…मला वाटतं तुझं टेंशन त्यामुळे संपेल.’’

प्रतिमानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. मागच्या वेळी सासूबाई क्षुल्लक कारणावरून नाराज होऊन इथून गेल्या होत्या. ती कडू आठवण मनांत ताजी होती.

‘‘हे बघ प्रतिमा, जोपर्यंत बाबा हयात होते तोवर मला आईची काळजी नव्हती. पण बाबा गेल्यावर आलेला एकटेपणा तिला पेलवंत नाहीए. तिला खूप असुरक्षित, एकाकी वाटतं. तूच विचार कर, ज्या घरात तिचं एकछत्री साम्राज्य होतं, ते घर आता नाही. लग्नानंतर मुलांचा ताबा सुनांनी घेतला. जे घर तिनं काडी काडी जोडून तयार केलं होतं, ते बाबांच्या मृत्युनंतर बंद करावं लागलं…

‘‘आईला एकटं ठेवायचं नाही म्हणून मग ती इथं अन् दादाकडे अमेरिकेला राहते…म्हणजे तिला राहावं लागतं. इथं तिला मोकळेपणा वाटत नाही. त्यामुळे तिची चिडचिड होते. गावातल्या घरात असलेला मोकळेपणा, तिची सत्ता इथं तिला मिळत नाही. मनांतला असंतोष संधी साधून उफाळून येतो…’’

प्रतिमाला श्रवणचं बोलणं पटत होतं. ती लक्षपूर्वक ऐकत होती.

‘‘एक लक्षात घे, आईला आपल्याकडून पैसा अडका नकोए. बाबांची पेन्शन तिला पुरून उरते. तिला थोडी विचारपूस, थोडा मानसन्मान हवा असतो. तेवढं मिळालं की ती खुष होते. थोडी तडजोड तुला करावी लागेल. करशील का?’’

‘‘करेन, प्रयत्न तरी नक्कीच करेन.’’

‘‘असं बघ,’’ श्रवण पुढे बोलू लागला. ‘‘अगं या वयस्कर लोकांमध्ये ‘अहं’ फार असतो. तसा तो आपल्यातही असतोच. पण दोघांचे अहंकार एकमेकांना भिडले की प्रचंड स्फोट होतो. कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं, मनं दुभंगतात अन् अगदी कारण नसताना माणसं एकमेकांची वैरी होतात. आपण फक्त एवढीच काळजी घ्यायची की आईचा अहंकार दुखावला जाणार नाही, आई तशी प्रेमळ आहे गं! अजून तुला तिचा फारसा सहवासच मिळाला नाहीए. पण तुझ्या सेवेनं, तुझ्या नम्र वागण्यानं, तुझ्या गोड बोलण्यानं तू तिला जिंकून घेशील याची मला खात्री आहे.’’

‘‘म्हणजे मी नेमकं काय करायचं?’’

‘‘अगदी सोप्पं आहे. आईसमोर दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन वावरायचं, तिला वाकून नमस्कार करायचा. तिला काय हवं नको याकडे जातीनं लक्ष द्यायचं. रात्री झोपण्यापूर्वी तिचे दुखरे पाय चेपायचे, बघ ती कशी हुरळून जातेय ती.’’

‘‘करेन की! लक्षात ठेवून सर्व करेन.’’ प्रतिमा आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती.

‘‘आणि एक गोष्ट…प्रत्येक काम करण्याआधी आईला विचारून घेत जा. घरात घडणार तेच आहे जे तुला अन् मला हवंय, पण तिचा विचार घेतला, तेवढा मोठेपणे तिला मिळाला की तिचं प्रेमळ मन सुखावतं. तिच्या म्हणण्याला मान दिलास की बघ ती तुझे कसे लाड करेल…’’

‘‘तुम्ही बघाल, यावेळी मी त्यांना तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही.’’

रात्रीची जेवणं आटोपल्यावर प्रतिमानं थोडा वेळ बसून पुढील काही दिवसांच्या कामाचं वेळापत्रक आखून घेतलं. रात्री अगदी शांत झोप लागली तिला.

सकाळी लवकर उठून तिनं सासूबाईची खोली अगदी झकास स्वच्छ करून घेतली. त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू आवर्जून तिथं मांडल्या. त्यांना आवडणाऱ्या भाज्या फ्रीजमध्ये विराजमान झाल्या.

वेळेवारी प्रतिमा आणि श्रवण एयरपोर्टवर पोहोचले. मुलगा सून दिसताच आईचे डोळे आनंदानं चमकले. त्यांची ट्रॉली स्वत:कडे घेत प्रतिमानं वाकून नमस्कार केला. आईला कृतार्थ वाटलं. तिनं तोंडभरून आशिर्वाद दिला.

नातू दिसला नाही तेव्हा आजीनं विचारलं, ‘‘सुनबाई नातू दिसत नाहीए गं?’’

‘‘आई, तो झोपला होता…म्हणून कामवाल्या काकूंना घरी बसवून तुम्हाला घ्यायला आले.’’

‘‘अगं, मुलांना असं गडीमाणसांवर सोपवू नये. हल्ली काय न् काय ऐकायला येतं ना?’’ आई म्हणाल्या.

‘‘खरंय आई, यापुढे लक्षात ठेवेन.’’ प्रतिमानं आश्वासन दिलं.

घरी पोहोचताच पाच वर्षांचा नातू धावत आला अन् त्यानं आजीला मिठी मारली. आजीला त्यानं आजीची खोली दाखवली. स्वच्छ नीटनेटकी मांडलेली खोली व आकर्षकरित्या मांडलेलं सामान बघून आई सुखावल्या.

‘‘आई तुम्ही स्नान करणार आहात की आत्ता फक्त हातपाय तोंड धुताय?’’

गरम चहाचा कप सासूच्या हातात देत सुनेनं विचारलं.

‘‘मला वाटतं मी स्नान केलं की माझं आखडलेलं अंग मोकळं होईल. विमानात बसून दमले गं बाई!’’ सासूबाई चहा घेता घेता बोलत होत्या.

स्नानगृहात दोन बादल्या सणसणीत गरम पाणी स्वच्छ पंचा, सुगंधी साबण सगळी जय्यत तयारी होती.

रात्रीची भाजी आईंना विचारून केली होती. स्वयंपाक छान होता. सासूबाई मनापासून जेवत होत्या. नातू शेजारीच जेवायला बसला होता. सून गरम फुलके करून वाढत होती.

जेवताना मुद्दामच श्रवणनं म्हटलं, ‘‘प्रतिमा, उद्या नाश्त्याला भाजणीचं थालीपीठ कर ना. पण आईला नीट विचारून घे. छान खुसखुशीत व्हायला हवं.’’

‘‘आई, उद्या मला जरा सांगाल हं…’’ प्रतिमानं म्हटलं. आई सुखावल्या.

आईंच्या खोलीची स्वच्छता मोलकरणीकडून न करवता प्रतिमा स्वत:च करायची. कारण आईंना प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ, व्यवस्थित व जागच्या जागी हवी असायची. मोलकरीण इतक्या निगुतीनं सगळं करेल हे शक्यच नव्हतं.

एक दोन दिवसांनंतर प्रतिमा आईंच्या खोलीत काहीतरी काम करत असताना एक फाइल सापडत नाही यावरून श्रवणनं घर डोक्यावर घेतलं. प्रतिमा त्यावेळी आईंचे वाळलेले कपडे घड्या घालून ठेवत होती. आई म्हणाल्या, ‘‘अगं, ते सोड ते काम. तो बघ काय म्हणतोय, सगळं घर डोक्यावर घेतलंय.’’

अंघोळीच्या आधी डोक्याला व अंगाला तेल लावायची सवय होती आईंना. त्यांच्यासाठी खास लाकडी घाण्यावरचं तेल प्रतिमानं आणून ठेवलं होतं. आईंना तेलाची बाटली हातात घेताच प्रतिमा म्हणाली, ‘‘आई, मी लावून देते तेल…बघा माझ्या हाताची कमाल. खूप बरं वाटेल तुम्हाला.’’

‘‘राहू दे गं! तशीच घरातली, बाहेरची बरीच कामं असतात तुला…’’

‘‘कामं होतील हो,’’ म्हणत प्रतिमानं बाटली उघडून त्यांच्या डोक्याला तेल लावायला सुरूवात केली.

‘‘आई, अजूनही तुमचे केस किती छान आहेत. तरूण वयात तर तुम्ही ब्युटी क्वीनच असाल ना?’’

‘‘अगं, आमच्या वेळी अशी काही प्रस्थं नव्हतीच ना? पण श्रवणचे बाबा मला अधूनमधून चिडवायचे, तुझ्या कॉलेजातली किती मुलं तुझ्यावर मरत होती सांग बरं! बोलता बोलता या वयातही त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली.’’

प्रतिमाला गंमत वाटली. तिनं मुद्दाम त्यांना छेडलं.

‘‘हे म्हणत होते की त्यांचे बाबा तुम्हाला माहेरीही जाऊ देत नसत. एक दिवसही तुम्ही नसलात तर त्यांना करमत नसे…खरं आहे का हे?’’

आता मात्र आई चक्क लाजल्या. प्रेमानं तिला एक चापटी मारून म्हणाल्या, ‘‘चल, फाजिल कुठली, माझी चेष्टा करतेस काय? चल, निघ इथून…’’

हलक्या हातानं प्रतिमानं त्यांचं अंग रगडून दिलं. गरम पाण्याच्या अंघोळीनं त्या खूपच सुखावल्या. मनापासून सेवा करण्याचा आनंद प्रतिमालाही सुखावून गेला.

एक दिवस श्रवणनं ऑफिसातून येताना सिनेमाची दोन तिकिटं आणली. आईंना सिनेमा आवडत नसे. त्यांना नाटक बघायला आवडायचं. प्रतिमानं विचारलं, ‘‘आई सिनेमाला जायचंय आपल्याला…आवरून घ्या. तसा वेळ आहे अजून.’’

‘‘नाही गं! मुळात मला ना, सिनेमाची आवड नाही…असं कर, तुम्ही दोघं जा. बाळाला मी बघते.’’

प्रतिमा काही क्षण तिथेच घुटमळली. ‘‘खरंच, जा तू तेवढंच तुम्हा दोघांना एकत्र राहता येईल.’’ आई म्हणाल्या.

व्वा! आंधळा मागतो एक डोळा…तसं झालं. दोघं पिक्चर बघून आली तेव्हा आईंनी स्वयंपाक तयार ठेवला होता. प्रतिमाला आवडणारे भोपळ्याचे काप अन् श्रवणच्या आवडीची फणसाची भाजी! व्वा!! प्रतिमानं पटकन् गस पेटवला अन् तयार असलेल्या कणकेच्या फुलक्या लाटायला घेतल्या.

‘‘प्रतिमा, तू बैस श्रवणबरोबर, मी देते गरम फुलके.’’ आईंनी म्हटलं.

‘‘नको आई, सगळा स्वयंपाक एकटीनं केलात तुम्ही. तुम्हीच बसा. आता होताहेत फुलके.’’ प्रतिमानं म्हटलं.

श्रवणनं तोडगा काढला. ‘‘प्रतिमा तू पटापट फुलके कर. आपण सगळे एकत्रच जेवूयात.’’

एकाच टेबलवर सगळे एकत्र जेवायला बसले. आईंना खूपच छान वाटलं. त्यांचे डोळे पाणावले. ‘‘आई काय झालं?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘तुझ्या बाबांची आठवण आली. आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.’’ आई म्हणाल्या.

‘‘खरंय आई, पण आज हा आनंद ते तुमच्या डोळ्यांनी बघताहेत.’’ प्रतिमानं मृदु आवाजात म्हटलं.

मग ती श्रवणला म्हणाली, ‘‘अशी भाजी फक्त आईच बनवू शकतात. आई, तुमच्या हातची चव माझ्या हाताला आली पाहिजे.’’

‘‘तू ही छान करतेस गं स्वंयपाक,’’ आई म्हणाल्या.

‘‘मी तुमच्यासारखीच सुगरण होण्याचा प्रयत्न करतेय आई.’’ प्रतिमानं म्हटलं. श्रवण सासूसुनेचं सख्य बघून सुखावला होता. एकमेकांना मान देण्यानं घरात केवढं सुख भरभरून वाहत होतं.

दिवाळीचा बोनस घेऊन श्रवण घरी आला अन् त्यानं ते पाकीट प्रतिमाला दिलं. प्रतिमा म्हणाली, ‘‘आपण आईंना देऊयात. त्यांना बरं वाटेल.’’

आईंनी पाकीट बघितलं, ‘‘तुझे बाबा असाच बोनस आणून माझ्या हातात ठेवायचे. आता तू बोनसचे पैसे माझ्या सुनेला देत जा.’’ आई मनापासून म्हणाल्या.

आता प्रतिमालाही समजलं होतं की तिची सासू अत्यंत साधी, नीटनेटकेपणाची आवड असणारी, सुगरण अन् प्रेमळ बाई आहे. तिला पैसा, अडका, कपडा, लत्ता काहीच नकोय. सुर्देवानं तिचं आरोग्य चांगलं असल्यामुळे औषधांचाही खर्च नसतो. फक्त थोडी विचारपूस, थोडा मोठेपणा मिळाला की त्यांना सुरक्षित वाटतं. मुलाच्या बरोबरीनं त्या सुनेवर प्रेम करतात. नातू तर त्यांच्या काळजाचा तुकडा आहे.

दिवाळीची साफसफाई करताना प्रतिमा स्टुलावरून पडली. पाय मुरगळला. आईंनी तिला पलंगावर बसवलं. पायाला आयोडेक्स चोळलं. व्यवस्थित क्रेप बँडेज बांधलं.

‘‘वा, वा! सुनेनं सासूची सेवा करायची तर सूनच सेवा करवून घेतेय.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘गप्प रे!’’ आई त्याच्यावर डाफरल्या. ‘‘ही माझ्या मुलीसारखी आहे. मी तिची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची?’’

‘‘आई, मुलीसारखी का म्हणता? मी मुलगीच आहे तुमची.’’ प्रतिमानं म्हटलं. आईंना भरून आलं. तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, ‘‘खरंच म्हणतेस पोरी, मला मुलगी नव्हती. तुझ्या रूपानं मुलगी मिळाली.’’

आंबेहळदीचा लेप व भरपूर विश्रांती यामुळे लवकरच प्रतिमाचा पाय बरा झाला. दिवाळीचा उत्साह सगळ्यांनाच होता. सासूसुनेनं मिळून घराची सजावट बदलली. फराळाचे पदार्थही नेहमीपेक्षा जास्त केले. कारण एकमेकींची मदत होती. प्रतिमाला चिरोटे अन् अनरसे खूप छान जमत नसत. यावेळी तिनं आईंकडून त्यातले सर्व बारकावे समजून घेतले होते. दोन्ही पदार्थ छान जमले होते. आईंच्या संमतीनं तिनं यंदा तिच्या मैत्रिणींना फराळाला बोलावलं होतं. एक दिवस सोसायटीतल्या समस्त सासवाही फराळाला येणार होत्या.

‘‘माझा नंबर लागणार आहे की नाही?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘नाही!’’ सासूसून एकदमच बोलल्या अन् सगळे हसायला लागले.

तेवढ्यात अमेरिकेहून दादाचा फोन आला. नंदिनीनं काही तरी म्हटल्यावर आई दुखावल्या होत्या. नाराज होऊन इथं आल्या होत्या. नंदिनीला अन् दादाला फार पश्चात्ताप होत होता. आईची क्षमा मागायला ती दोघं दिवाळीतच येणार होती. दादा अन् नंदिनीवहिनीला आईला सरप्राइज द्यायचं होतं म्हणून ही गोष्ट कुणाला सांगू नये म्हणून दादानं बजावलं होतं. श्रवणला खूप आनंद झाला. कितीतरी वर्षांनी सगळे असे एकत्र दिवाळी साजरी करणार होते.

आपला आनंद आणि उत्साह लपवताना श्रवणला खूपच सायास पडत होते. प्रतिमानं विचारलंसुद्धा, ‘‘तुम्ही खूपच आनंदात आहात…काय विशेष घडलंय?’’

‘‘छे: कुठं काय? तुम्हा सासवासुनांचा आनंद, उत्साह अन् प्रेम बघून मलाही आनंद होतोय.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘दृष्ट नका लावू हं आमच्या प्रेमाला.’’ प्रतिमानं दटावलं.

नर्कचतुर्दशीची पहाटेची अभ्यंग स्नानं, फटाके, फराळ वगैरे आटोपले. सायंकाळी लक्ष्मीपूजन होतं. आईनं आपल्या सूटकेसची किल्ली प्रतिमाला दिली अन् त्यातून लाल रंगाचा मखमली बॉक्स काढून आणायला सांगितलं. प्रतिमानं डबा आईच्या हातात दिला. तसा तो उघडून आईनं त्यातून सोन्याचा भक्कम नेकलेस काढून प्रतिमाला दिला. ‘‘सूनबाई, हा हार तुझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी खास घडवून आणला होता. आता यावर तुझा हक्क आहे. रात्री पुजेच्यावेळी नक्की घाल.’’ आईंचे डोळे भरून आले.

प्रतिमानं तो हार हातात घेऊन कपाळाला लावला आणि आईला नमस्कार केला. आईनं मनापासून आशिर्वाद दिले.

सायंकाळी पुजेची तयारी मांडून झाली दिवे पणत्यांनी घरदार, अंगण परिसर उजळला. तेवढ्यात बाहेर टॅक्सी थांबली.

आई पूजेसमोर येऊन बसली तेवढ्यात दादावहिनी येऊन आईच्या पाया पडले. आईला वाटलं आम्ही दोघं आहोत, ‘‘चला, पूजा सुरू करूयात,’’ ती म्हणतेय तोवर तिच्या लक्षात आलं की आम्ही दोघं बाजूला होतो. तिच्या पायाशी दादावहिनी आहेत. ती चकित झाली. तिला अजिबात कल्पना नसताना अमेरिकेतून नातवंड, मुलगा, सुनेनं येऊन आनंदाचा, आश्चर्याचा धक्का दिला होता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

‘‘आई मला क्षमा करा,’’ नंदिनीवहिनीच्या डोळ्यांत अश्रू होते. आईनं तिला आवेगानं जवळ घेतली. तिचेही डोळे वाहत होते. पण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद होता. बाहेर दिवे लखलखत होते. इथे घरातही सर्वांच्या मनांत दीप उजळले होते.

वॉर्निंग साइन बोर्ड

कथा * सुधा ओढेकर

आपलं ऑफिस संपवून निशा निधीला घ्यायला शाळेच्या पाळणाघरात पोहोचली तेव्हा नेहमी धावत येऊन तिला बिलगणारी निधी नीट चालूही शकत नसल्याचं तिला जाणवलं.

निशाला बघताच तिथली अटेंडंट म्हणाली, ‘‘मॅडम, निधी आज दुखतंय म्हणत होती. डॉक्टरना दाखवलं तर त्यांनी हे औषध दिलंय. या गोळ्या दिवसातून दोनदा अन् या तीनदा द्यायच्या आहेत.’’

‘‘तुम्ही मला फोन का केला नाही?’’

‘‘केला होता मॅडम, पण लागला नाही. डॉक्टरांकडे नेलं होतं.’’

‘‘बरं, डॉक्टरांची चिठ्ठी?’’

‘‘मला फक्त हे एवढंच दिलं गेलंय. चिठ्ठी नाहीए.’’

कदाचित तिच्याकडून प्रिस्क्रिप्शन हरवलं असेल म्हणून खोटं बोलतेय. निशाने तरीही शाळेला धन्यवाद दिले. शाळा खरंच चांगली आहे. तिने निधीला उचलून आणून कारमध्ये बसवले. निधी लगेच झोपली. खरं तर शाळा दुपारी अडीचला सुटते. पण घरी कुणी बघणारं, सांभाळणारं नाही म्हणून नाइलाजाने निशा निधीला शाळेच्या पाळणाघरात ठेवते. आपल्या अत्यंत व्यस्त अन् धावपळीच्या आयुष्यात आपण पोरीवर अन्याय करतोय असंही तिच्या मनात येई. मुलीकडे लक्ष द्यायचं तर नोकरी सोडावी लागेल. पण पुन्हा अशी चांगली नोकरी मिळणार नाही ही गोष्टही तेवढीच खरी.

घरी गेल्यावरही निधी झोपलेलीच होती. तिला उचलून निशाने बेडवर झोपवली. कदाचित आता तिचं दुखणं थांबल्यामुळे किंवा डॉक्टरांच्या गोळीमुळे तिला गाढ झोप लागली आहे तेव्हा झोपू दे असा विचार करून निशाने रात्री निधी जेवली नाही तरी तिला तशीच झोपू दिली. रात्री केव्हा तरी झोपेत निधी बडबडत होती. निशाची झोप उघडली. तिने निधीला थोपटलं तेव्हा लक्षात आलं की निधीला ताप आहे. ती झोपेतच बडबडत होती. ‘‘मी घाणेरडी मुलगी नाही. मला पनिश करू नका.’’

निधी असं का बोलतेय ते निशाला कळेना. तिला शाळेत कुणी शिक्षा केली का? कुणी पनिश केलं का? पण का? तिला जे दुखतंय ते कशामुळे? तिने दुसऱ्या दिवशी ऑफिसची रजा टाकली.

निधी सकाळी दहाच्या सुमारास जागी झाली. निशा तिच्या जवळच होती. निशाला मिठी मारून ती रडायला लागली. रडता रडताच बोलली, ‘‘ममा, मी शाळेत जाणार नाही.’’

‘‘का गं, बेटा? शाळेत कुणी तुला काही म्हटलं का?’’ निशाने आश्चर्याने विचारलं.

‘‘मी शाळेत जाणार नाही,’’ पुन्हा ती तेच म्हणाली.

‘‘पण बाळा, शाळेत तर सर्वंच मुलांना जावं लागतं?’’

‘‘नाही, नाही…मी जाणार नाही…’’ ती हुंदके देत रडत म्हणाली.

‘‘बरं बरं…रडू नकोस. तू म्हणशील तेव्हाच तुला शाळेत पाठवेन.’’ निशाने तिला थोपटून शांत करत म्हटलं.

तिने मनात ठरवलं, उद्या सकाळी आधी शाळेत जाऊन टीचरला भेटलं पाहिजे. अत्यंत उत्साहाने शाळेला जाणाऱ्या या पोरीला एकाएकी शाळेचा तिटकारा का वाटू लागला? शिवाय झोपेत ती सारखी पनिश…पनिश म्हणत होती. त्याबद्दलही विचारायचं हे ठरवल्यावर तिचं मन शांत झालं.

निशाने निधीला दूध दिलं, ब्रेकफास्ट दिला. निधी पुन्हा झोपली होती. बेचैन होती. नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. चिवचिवत नव्हती. निशाने तिला स्पंज करून कपडे बदलले तेव्हा निधीच्या पॅण्टीवर रक्ताचे डाग दिसले. निशा दचकली. सातव्या वर्षीच पाळी सुरू झाली की काय? अन् सारखं दुखतंय…दुखतंय का म्हणतेय? किती कोमेजलली आहे…निशाने सरळ डॉ. संगीताला फोन केला अन् ती निधीला घेऊन तिच्या क्लीनिकमध्ये गेली.

डॉ. संगीताने निधीला तपासलं अन् अभावितपणे ती बोलून गेली, ‘‘ओह…नो…’’

‘‘काय झालं, डॉक्टर?’’

तिला बाजूला घेऊन खाजगी आवाजात डॉ. संगीता म्हणाली, ‘‘निशा, अगं या पोरीवर रेप झालाय…’’

‘‘रेप?’’ निशा केवढी दचकली.

‘‘पण केव्हा? कुठे? काल तर ती शाळेतच होती. इतर कुठे गेलीच नव्हती,’’ आश्चर्य अन् भीती, काळजी यामुळे निशाला बोलणं सुधरेना.

‘‘पण हे सत्य आहे निशा, केवळ अंदाज नाही.’’

‘‘देवा रे!’’ डोकं धरून निशा तिथल्या खुर्चीवर बसली. काय चाललंय या जगात? इतक्या कोवळ्या, अजाण, निष्पाप पोरीवर बलात्कार? माणुसकीचे वाभाडे काढणारे हे राक्षस…कोण असेल हा सैतान?

‘‘निशा, तू आधी स्वत:ला सांभाळ. शांत हो, आपल्याला या अजाण पोरीला सावरायचं आहे. नेमकं काय, केव्हा, कुठे घडलं याचा छडा लावावा लागेल,’’   डॉ. संगीताने निशाला समजावलं.

निशाने निधीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही वेदना होती. ती मुकाट बसून होती. डॉ. संगीताने तिला प्रेमाने विचारलं, ‘‘बाळा, तुला हा त्रास कसा झाला?’’

निधीने उत्तर दिलं नाही. ती गप्प बसली होती. तिला प्रेमाने जवळ घेत निशाने म्हटलं, ‘‘डॉक्टर आण्टी विचारताहेत त्या प्रश्नाचं उत्तर दे ना, तुला कसं दुखलं, त्रास कशामुळे झाला?’’

‘‘नाही मम्मा, मी सांगणार नाही. टीचर मला मारतील.’’

‘‘का?’’

‘‘टीचर म्हणाल्या, तू घरात कुणाला काही सांगितलंस तर मी तुला मारीन. घरी तुझे आईबाबाही तुला रागावतील. तू चूक केली आहेस. तू वाईट, घाणेरडी मुलगी आहेस म्हणून तुला पनिशमेण्ट मिळाली आहे. पण ममा, मी काहीच केलं नाहीए गं…खरंच…’’ ती लहानगी पुन्हा रडायला लागली. डॉक्टरही गडबडून गेली.

‘‘बाळा, तू आम्हाला सांग, आम्ही तुला रागावणार नाही, उलट त्या टीचरलाच रागावू. तू न घाबरता सांग. टीचर इथे येणार नाही. मीच तिला रागावणार आहे. सांग, रडू नकोस. मी तर तुला औषध देऊन बरं करणार आहे.’’

डॉ. संगीताने अन् निशाने वारंवार समजावल्यावर निधीने जे सांगितलं ते ऐकून दोघी अवाक् झाल्या. एका स्वीमिंग इन्स्ट्रक्टरचं हे काम होतं.

‘‘निशा, त्या नराधमाच्या विरुद्ध केस कर. निधीचं सगळं बोलणं मी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलंय. तिच्या तपासणीचे रिपोर्ट मी व्यवस्थित तयार करते. मी साक्ष देईन कोर्टात.’’ संतापाने डॉ. संगीता लालेलाल झाली होती.

निशाने रात्री निधी झोपल्यावर दीपकला सगळं सांगितलं. दीपक संतापला. ‘‘मी त्या हरामखोराला असा सोडणार नाही. त्याला तुरुंगातच पाठवतो.’’

‘‘मलाही तुमच्यासारखाच संताप आला होता दीपक, पण मला भीती वाटली. या सर्व प्रकारात आपल्या मुलीची अन् आपलीही बेअब्रू होईल. पोरीला समाजात वावरता येणार नाही. तिच्या बालमनावर विपरीत परिणाम होईल.’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय, पण अशाने त्या गुन्हेगाराला बळ मिळतं. आज आपल्या मुलीच्या बाबतीत जे घडलं, ते उद्या आणखीही कुणाच्या बाबतीत घडेल.’’

शेवटी त्यांनी एफआरआय नोंदवली. एका अल्पवयीन मुलीवरील रेपच्या संदर्भात डॉ. संगीता अन् तिची साक्ष महत्त्वाची ठरली.

निधीने आरोपीला ओळखल्यावरही शाळा हा आरोप मान्य करत नव्हती. पण मीडिया अन् अनेक पालकांनी मुद्दा लावून धरला. शेवटी त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली.

दुसऱ्यादिवशी सगळ्या वर्तमानपत्रातून ठळकपणे ही बातमी प्रसिद्ध झाली. यलो लाइन इंटरनॅशनल स्कूलच्या सात वर्षांच्या मुलीवर रेप. स्वीमिंगच्या क्लासनंतर मुलगी कपडे बदलायला वॉशरूमकडे केली तेव्हा इन्स्ट्रक्टरही तिच्या मागे मागे तिथे गेला. तिच्या तोंडात बोळा कोंबून त्याने तिला जीवे मारण्याची भीती दाखवून बलात्कार केला. वर पुन्हा कुणाजवळ बोललीस तर खबरदार म्हणून धमकीही दिली. क्लास टीचरने तिला घाबरलेली व रडताना बघितली तेव्हा तिने काय झालं म्हणून विचारलं. ती लहान पोरं फक्त दुखतंय म्हणत होती, रडत होती. क्लास टीचरने प्रिन्सिपलला सांगितलं. प्रिन्सिपलने डॉक्टरांना बोलावून चेकअप करवून घ्या म्हणून सांगितलं.

डॉक्टरने जुजबी काही तरी औषधं देऊन वेळ भागवली. टीचरने मुलीला धमकावलं की याबद्दल घरी काही सांगू नकोस, तू वाईट मुलगी आहेस म्हणून तुला पनिशमेण्ट दिली आहे. घरी बोललीस तर तुझे आईबाबाही तुला रागावतील.

निशा म्हणाली, ‘‘वाचा बातमी, सगळीकडे आपली बेअब्रू होतेय.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नकोस. निधीचं किंवा आपलं नाव कुठेही आलेलं नाहीए.? खरं तर त्या क्लास टीचरला, प्रिन्सिपलला अन् त्या नालायक डॉक्टरलाही कोर्टात खेचायला हवंय.’’

‘‘पण आज नाही तर उद्या आपलं नाव बाहेर कळेलच ना?’’

‘‘नाही कळणार. अन् त्या हरामखोर गुन्हेगाराला मी असा सोडणारही नाहीए. मी चांगला वकील मिळवला आहे.’’

‘‘पण यात खूप वेळ जाईल. निधी आता त्या शाळेत जायचं नाही म्हणतेय. तिच्या मनातली भीती कमी करण्यासाठी आपण दुसऱ्या शहरात जाऊ.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘तुम्ही बदली करून घ्या.’’

‘‘ते इतकं सोपं नाहीए.’’

‘‘निधीसाठी काहीही करावं लागलं तरी ते करायला हवं. मी माझ्या ऑफिसमध्ये बोलले आहे. मला दिल्लीला बदली मिळतेय.’’

‘‘ठीक आहे, मीही प्रयत्न करतो.’’

निधीला घेऊन निशा दिल्लीला आली. तिच्या एका मैत्रिणीकडे उतरली. ऑफिसमध्ये जॉइन केलं अन् मग निधीच्या अॅडमिशनसाठी एका प्रसिद्ध शाळेत एकटीच गेली. टी.सी. बघून प्रिसिपॉलने म्हटलं, ‘‘यलो लाइन इंटरनॅशनल स्कूल याच शाळेतल्या स्वीमिंग इन्स्ट्रक्टरने एका लहान मुलीवर रेप केला होता ना? पेपरला वाचलं होतं.’’

‘‘होय मॅडम, आम्हीही वाचलं होतं. माझी इथे बदली झाली आहे म्हणून मी मुलीला घेऊन इथे तिच्या अॅडमिशनसाठी आले आहे.’’

‘‘तुम्ही भाग्यवान आहात. आठवड्यापूर्वीच एक मुलगी वडिलांची बदली झाल्यामुळे दुसऱ्या गावी गेली आहे. त्या जागी तुमच्या मुलीला अॅडमिशन देता येईल.’’

‘‘थँक्यू मॅडम,’’ निशाने कृतज्ञतेने हात जोडून नमस्कार करत त्यांचा निरोप घेतला.

‘‘मोस्ट वेलकम!’’

निशा ज्या मैत्रिणीकडे उतरली होती तिचीही मुलगी त्याच शाळेत शिकत होती. तिनेच ही ‘डीपीएस’ शाळा सुचवली होती.

घरी येऊन निशाने निधीला शाळेविषयी सांगितलं तर ती म्हणाली, ‘‘मला शाळेत जायचं नाही.’’

‘‘अगं, पण ही शाळा वेगळी आहे. छान आहे. तुला आवडेल.’’

‘‘मला नाही जायचं…’’

‘‘अगं. शुची पण तुझ्याच शाळेत शिकते.’’

‘‘ती माझ्या वर्गात बसेल?’’

‘‘नाही बाळा, ती थोडी मोठी आहे ना, तिचा वर्ग वेगळा असेल पण तुझ्याबरोबर शाळेत जाईल, तुझ्याबरोबर परत येईल.’’

शुचीने निधीकडे बघून हसत संमतीदर्शक मान हलवली.

निशाने शनिवार, रविवार निधीला मानसिक दृष्टीने तयार करण्यात घालवला. दोन दिवस तिने निधीला अन् शुचीलादेखील आपल्या कारने शाळेत सोडलं. त्यानंतर शाळेच्या बसचे पैसे भरून झाल्यावर शुची व निधी स्कूल बसने जाऊयेऊ लागल्या.

नव्या वातावरणात शाळेच्या एकूणच सेटअपमध्ये निधी लवकरच रमली. शुचीच्या संगतीत हसू, खेळू, बोलू लागली. पण अजूनही ती रात्री मध्येच दचकून जागी व्हायची किंवा ‘मला पनिश करू नका,’ असं म्हणत झोपेतच रडायची. तिला एखाद्या सायकॉलॉजिस्टची गरज होती.

शुचीच्या घरी तरी किती दिवस राहाणार. सुर्देवाने शुचीच्या आईने अलकाने बातमी आणली की त्यांच्याच अपार्टमेण्टमध्ये एक फ्लॅट रिकामा झालाय. घरमालक तिच्या माहितीतले असल्याने निशासाठी तो भाड्याने मिळवण्यात अडचण आली नाही. शनिवार, रविवारच्या सुट्टीत अलकाच्या मदतीने निशाने आपलं बिऱ्हाड बाजलं नव्या फ्लॅटमध्ये नेलं. दीपकने गरजेच्या काही वस्तू टे्रनच्या ब्रेकव्हॅनमधून पाठवून दिल्यामुळे घर आता बऱ्यापैकी सोयिस्कर झालं.

त्यातच समाधानाची गोष्ट म्हणजे दीपकचा फोन आला. ‘‘निशा, शाळेने त्या इन्स्ट्रक्टरला काढून टाकलंय. शिवाय वकिलाला घेऊनच प्रिन्सिपल, क्लासटीचर अन् त्या डॉक्टरलाही भेटलो. जो हलगर्जीपणा प्रिन्सिपल अन् डॉक्टरने केला अन् ‘तू घाणेरडी मुलगी आहेस म्हणून तुला शिक्षा केली. घरी सांगू नकोस,’ असं धमकावणाऱ्या टीचरलाही कोर्टाचा हिसका देतो म्हटल्यावर डॉक्टर अन् प्रिन्सिपलने स्पेशल शरणागती पत्करून माफीनामा लिहून दिलाय. त्या टीचरलाही नोकरीवरून काढून टाकली  आहे शिवाय ट्रीटमेण्टचा खर्च शाळा देणार आहे.’’

दुसरी चांगली बातमी म्हणजे वकिलाने कोर्टाकडून परवानगी मिळवली आहे की मुलगी लहान आहे शिवाय तिला सायकिक ट्रीटमेण्ट व जागा बदलण्यासाठी दिल्लीला पाठवली आहे तेव्हा तिला कोर्टात हजर राहाण्याची सक्ती करू नये किंबहुना तिला कोर्टात गैरहजर राहाण्याची परवानगी द्यावी. डॉ. संगीता साक्ष द्यायला येणार आहेत अन् त्यांनी मोबाइलवर रेकॉर्ड केलेलं निधीचं स्टेटमेण्ट कोर्टात चालणार आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ऑफिसने दिल्लीला पाठवण्याचं कबूल केलंय. दीड दोन महिन्यांत मी तिथे पोहोचेन.

निशाने दीपकचं अभिनंदन केलं. तो सतत केसच्या मागावर असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अन् एक नि:श्वास सोडला. मनावरचा ताण थोडा कमी झाला होता.

अलका हाउसवाइफ असल्याने शुची अन् निधी तिच्या घरातच शाळा सुटल्यावर राहायच्या. निशा आली की मग त्या आपल्या घरी यायच्या.

निशाने इंटरनेटवरून सायकियाट्रिस्ट डॉक्टर सुभाषचा पत्ता मिळवला व भेटीची वेळ ठरवून घेतली. आधी ती एकटीच डॉक्टरांना भेटायला गेली. निधीची केस त्यांना समजावून सांगितली अन् त्यांच्याकडून मदत हवीय असं म्हटलं.

डॉक्टर चांगले होते. ते म्हणाले, ‘‘उद्या याचवेळी तुम्ही पेशंटला घेऊन या. मुलगी लहान वयात वाईट अनुभवाला सामोरी गेली आहे. आपण हळुवारपणे तिच्या मनातली भीती काढून टाकू. तुमची मुलगी लवकरच पुन्हा अगदी नॉर्मल, आनंदी अन् निर्भर आयुष्य जगू लागेल. मी खात्री देतो. तुम्ही अगदी नि:शंक राहा.’’

‘‘मीही तेवढ्याच आशेने आलेय तुमच्याकडे.’’

दुसऱ्यादिवशी निशा निधीला घेऊन डॉक्टर सुभाषना भेटली. डॉक्टरांनी त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. निधीला नाव विचारलं. शाळा, वर्ग, मैत्रिणींबद्दल विचारून थोडं बोलतं केलं. मग म्हणाले, ‘‘निधी, अगं तुझी ममा सांगत होती, कधी कधी रात्री झोपेत तू ‘मला पनिश करू नका, पनिश करू नका, मी वाईट मुलगी नाहीए’ असं  म्हणतेस, दचकून उठतेस. तुला कोण पनिश करतं, बेटा?’’

निधीने आईकडे बघितलं.

‘‘सांग बाळा, न घाबरता सांग.’’

‘‘पण तू तर म्हणाली होतीस की कुणाला काही सांगायचं नाही म्हणून?’’

‘‘इतर कुणालाच नाही सांगायचं, पण हे तर डॉक्टरकाका आहेत ना? ते आपल्याला बरं करतात. त्यांना सांगितलं तर ते तुझ्या मनातली भीती दूर करतील, भीतीला हाकलून लावतील.’’ निशाने तिला प्रेमाने जवळ घेत म्हटलं.

‘‘बरं, गुड गर्ल. आता मला सांग की तुला त्या पोहणाऱ्या काकांनी त्रास दिला होता? तू वाईट मुलगी आहेस म्हणून तुला शिक्षा केली असं म्हटलं होतं?’’

निधी एकदम रडवेली झाली. ‘‘पण मी घाणेरडी मुलगी नाहीए. मी काहीच केलं नाहीए…मी…’’

‘‘हो ना बाळा, मी तेच तुला सांगतोय, तू घाणेरडी नाहीस, वाईट नाहीस, तू छानच आहेस. चांगली मुलगी आहेस. घाणेरडे अन् वाईट तर ते काका आहेत, ज्यांनी तुला त्रास दिला.’’

‘‘पण मग सुजाता मॅम पण म्हणाली की मी वाईट आहे म्हणून मला पनिश केलं,’’ निधी म्हणाली.

‘‘तुला माहीत आहे का? तुमच्या प्रिन्सिपल मॅडमने सुजाता मॅमला शाळेतून काढून टाकलंय. कारण तिने तुला ‘घाणेरडी मुलगी आहेस म्हणून पनिश केलं’ असं दटावलं अन् ‘घरी सांगू नकोस, तुझे आईवडील तुलाच रागावतील असं म्हटलं होतं. म्हणजे सुजाता मॅमलाच शिक्षा झाली. ना? आता ती शाळेत कुणाला त्रास देऊ शकणार नाही.’’

निधीला काय बोलावं ते कळेना.

‘‘बरं मला असं सांग, तू समजा आपल्या एखाद्या मैत्रिणीला मारलंस, तिला रक्त आलं तर चूक कोणाची?’’

‘‘माझी…’’

‘‘तर मग वाईट कोण?’’

‘‘मी…’’

‘‘बरोबर. पण जेव्हा त्या काकांनी तुला त्रास दिला तेव्हा तुझी चूक नव्हती. म्हणजे तू वाईट नाहीस, तर ते काका वाईट. खरं ना?’’

‘‘पण ममाने मला कुणाला काही सांगू नकोस असं का म्हटलं?’’

‘‘आई बरोबर म्हणाली, ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात ना, त्या पुन:पुन्हा बोलायच्या नाहीत. छान, छान नवं काही तरी करायचं, नवं काही तरी बोलायचं, कळलं?’’

‘‘हं!’’

‘‘तर आता निधी एक खूपच छान शहाणी मुलगी आहे. तिला कुणीही पनिश करणार नाही. ठीक आहे?’’

‘‘ओ. के.’’

‘‘निशा मॅडम, पुढल्या आठवड्यात पुन्हा एकदा या. मला खात्री आहे. आपण यशस्वी होऊ. लवकरच सगळं छान होणार आहे.’’

डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघी घरी परतल्या. त्याच रात्री दीपकचा फोन आला,  यलो लाइन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सी.सी.टीव्ही लावले गेले आहेत. इतरही अनेक शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात येत आहेत. निशाच्या मनात आलं, आता काहीही केलं तरी निधीच्या बाबतीत घडलेली घटना बदलली जाणार नाही. खरं तर, ‘‘तुम्ही सीसी कॅमेऱ्याच्या नजरेत आहात,’’ या वाक्याला अर्थच नसतो.  ती एक तऱ्हेची जाहिरात होते. कॅमेरा आहे याची जाणीव लोकांना नको, पण कॅमेऱ्याने आपलं काम बजावायला हवं.

निधीची केस कोर्टात शेवटच्या टप्प्यात होती. वकील फार चांगला होता. त्याच्यावर जबाबदारी सोपवून दीपकही दिल्लीला ऑफिसमध्ये जॉइन झाला होता. डॉ. सुभाषच्या ट्रीटमेण्टमुळे निधी आता त्या घटनेच्या प्रभावातून बाहेर पडली होती. शाळेत तिचा परफॉर्मन्स छान होता. टीचर तिच्यावर खूष होत्या. आपापल्या ऑफिसच्या कामात निशा अन् दीपकनेही प्रमोशन्स मिळवली होती. एकूण सगळं छान चाललं होतं. पण मध्येच एक बलात्काराची बातमी पेपरला आली अन् निशाचं भावविश्व पुन्हा ढवळून निघालं.

बातमीत म्हटलं होतं की सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासताना त्यात काही माणसं दिसताहेत. पण त्यांचे चेहरे झाकलेले असल्याने तपासावर मर्यादा येताहेत.

अशा कॅमेऱ्यांचा उपयोगच काय? निशाने तिरमिरीत वृत्तपत्रांसाठी पत्र लिहायला घेतलं :

महोदय,

आपल्याकडे सिनेमात दाखवतात तसं किंवा एरवीही पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत येतात. तो आवाज गुन्हेगारांना पळून जाण्याचाच इशारा असतो. अपराधी तेवढ्यात निसटतो. तसेच जागोजागी असलेले सी.सी. कॅमेरे लावले आहेत, तिथे आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहात असेही फलक लावले आहेत. ही सूचना गुन्हेगाराला सावध करते. त्या भागात वावरताना तो शिताफीने कॅमेऱ्याची नजर चुकवतो किंवा चेहरा अन् शरीर झाकून घेतो. मग गुन्हे घडतील अन् गुन्हेगार तावडीत न येता मोकाट फिरतील.

खटकणारी आणखी एक बाब म्हणजे, ‘आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहात’ असे फलक जागोजागी दिसतात. कुठे कॅमेरे चालू असतात तर कुठे महिनोंमहिने बंद पडलेले असतात. ते नीट करायला हवेत एवढीही जाणीव प्रशासनाला नसते. असे अर्धवट उपाय काय कामाचे? शासनाला गंभीरपणे या बाबतीत विचार करायला हवा.

पत्र लिहून तिने दिल्लीतल्या सर्वच प्रमुख व दुय्यम वर्तमानपत्रांना पाठवली. काही छापूनही आली, पण सहा महिने होऊनही बलात्काराच्या केसमध्ये आरोपी सापडले नाही. निधीच्या केसमध्येही अपराध्याला अजून शिक्षा झालेली नाही ही खंत होतीच. केसचा निकाल कधी लागेल कुणास ठाऊक.

निधी अन् शुचीने ज्युडो कराटेचा क्लास सुरू केला होता. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या संस्था आता अधिकच सक्रिय होत्या. शाळेतर्फेही मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न केले गेले होते. काळोख्या ढगाला रुपेरी किनार दिसू लागली होती.

वाग्दत्त वधू

* वीना श्रीवास्तव

समोरच्या त्या बंगल्याची साफसफाई अन् रंगरंगोटी सुरू होती. चारी बाजूंनी उगवलेलं गवत व झाडंझुडपं यामुळे तो बंगला भयाण वाटायचा. कितीवर्षापासून एक गंजलेलं कुलुप मुख्य दरवाजावर दिसायचं. आज जी बंगल्याचं तेज आणि वैभव झाकोळलेलं असलं तरी कोणे एके काळी तो बंगला नक्कीच फार सुंदर असावा. ऊन, पाऊस, वादळ, वारा सोसून बंगल्याच्या भिंती काळपटल्या होत्या. खिडकी दरवाजांची कळा गेली होती. पण भक्कम कडी कोयंड्यांच्या आधारे अजूनही दारं खिडक्या जागेवर होती.

कोण येणार आहे इथं रहायला? तनीषाची उत्सुकता चाळवली गेली होती. कुणी विकत घेतलाय का बंगला? इतका भव्य बंगला विकत घेणारा कुणी पैसेवालाच असणार. पण हल्ली तर लोकांना अर्पाटमेंट अन् फ्लॅटमध्येच रहायला आवडतंय. मग ही कोण वल्ली असणार जी या जुन्या वाड्याला नटवून सजवून इथं मुक्कामाला येणार आहे?

मनांत उत्सुकता हिंदोळत असतानांच एक तरूण तिच्याच घराकडे येताना दिसला. त्यालाच विचारावं का कोण येतंय इथं रहायला? पण नको, असेल कोणी चक्रम किंवा पुरातत्त्ववेत्ता जो इथं येऊ घातलाय, खरं तर या बंगल्याला काही ऐतिहासिक किंवा पौराणिक महत्त्व नाहीए, एवढं तिला ठाऊक होतं. पण कुणाला काय आवडेल हे आपण कसं ठरवणार?

‘‘माफ करा,’’ तो तरूण तिच्या गेटाशी उभा होता.

तिनं दचकून बघितलं…तो तिच्याशीच बोलला का? तिनं इकडं तिकडं बघितलं.

‘‘हॅलो, मावशी, मी तुमच्याशीच बोलतोय.’’ त्यानं म्हटलं. आपल्यासाठी त्यानं मावशी संबोधन वापरावं हे तिला जरा खटकलं. मी खरंच इतकी वयस्कर दिसते का? वय पन्नाशीला आलंय हे खरं असलं तरी दिसते तर अजून पन्नाशीचीच. बांधाही अटकर आहे. कुठं तरी केसात एखादा चंदेरी तार दिसतो पण बाकी केस काळेभोरच आहेत.

तिला थोडं विचित्र वाटलं पण ती गेटाकडे गेली. तो तरूण दिसायला देखणा अन् शालीन दिसत होता. ‘‘माझं नाव अनुज पंडित आहे. मला पाणी मिळेल का? आता घरात काम सुरू केलंय. पाण्याची लाइन आज सायंकाळपर्यंत सुरू होईल. पण आत्ताच्या गरजेचं काय?’’

‘‘बरोबर आहे. ये, आत ये. पाणी मिळेल.’’ तिनं माळ्याला हाक मारून सांगितलं, ‘‘नळाला पाईप लावून समोरच्या बंगल्यात पाणी जाऊ दे. त्यांचं काम होई तो नळ बंद करू नकोस.’’

‘‘ये रे, आत ये. मी चहा करते. भूकही लागली असेल ना?’’

चहा फराळ करता करता अनुजनं त्याच्या कुटुंबाची माहिती सांगितली. तो बंगला अविनाश पंडितांचा वडिलोपार्जित वारसा होता. अविनाशचे वडील अभय पंडित खूप वर्षांपूर्वी धंद्याच्या निमित्तानं नैरोबीला गेले अन् तिथंच स्थायिक झाले. अविनाशचं सगळं आयुष्य तिथंच गेलं. त्यांनीही धंदा छान वाढवला. त्यांची मुलंही तिथंच मोठी झाली. पण आता त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न, अनुजच्या बहिणीचं लग्न भारतातून करायचं आहे तेही आपल्या वडिलोपार्जित बंगल्यातून. म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय.

‘‘लग्नं कधी आहे?’’

‘‘पुढल्या महिन्यांत, २५ तारखेला. आता वेळ तसा कमी उरलाय त्यामुळे खूप घाई करावी लागतेय. तेवढ्यासाठी मला बाबांनी भारतात पाठवलंय.’’ चहाफराळ आटोपून तो निघून गेला. जाताना तीनतीनदा आभार मानले. तनु लगेच आरशासमोर जाऊन उभी राहिली. त्यानं मला मावशी का म्हटलं? तिनं निरखून स्वत:कडे बघितलं. अजूनही ती सुंदरच दिसंत होती

तनीषा एकटीच राहते. ती अविवाहित आहे, कॉलेजात प्रोफेसर आहे अन् एकटीच राहते हे आजूबाजूच्या सर्वांना ठाऊक आहे. तिचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. कुणी तरी कधी खासगीत तिच्या लग्न न करण्याबद्दल बोलतो पण कारण कुणालाच ठाऊक नाहीए. तनीषाला मात्र ती अजूनही कुमारी का आहे हे पूर्णपणे माहीत आहे. यात दोष कुणाचा होता? तिचा? नियतिचा, तिच्या घरच्यांचा? तिचाच? वेळेवारी तिच लग्नं झालं असतं तर आजा अनुजएवढा मुलगा असताच ना तिचाही? तिनं एक दीर्घ श्वास घेतला. ती स्वत:शी पुटपुटली, ‘‘प्रसन्न, कुठे आहेस रे? तुला माझी आठवण येते की पूर्णपणे विसरलास मला?’’ स्वत:शीच बोलताना ती तिच्या तारूण्यात शिरली.

‘‘तनु, आज क्लासनंतर भेटूयात.’’ प्रसन्ननं तिला म्हटलं. तिच्या तनीषा नावाचं लघुरूप तनु त्यानंच केलं होतं.

‘‘अरे, पण आज माझं प्रॅक्टिकल आहे. तेही शेवटच्या तासाला…त्यानंतर लगेच मला घरी जावं लागेल तुला ठाऊक आहे, थोडा ही उशीर झाला तरी आई खूप रागावते.’’

प्रसन्नला तिच्या भावनांची जाणीव होती. तरीही निघता निघता तो म्हणाला, ‘‘ठीक आहे, तरीही, मी तुझी वाट बघेन.’’

‘‘बघते,’’ हसून तनीषा म्हणाली.

तनीषा एम.ए, करत होती. प्रसन्न तिचा सीनियर होता. तो पीएचडी करत होता. तिला अभ्यासात मदतही करायचा. तो विलक्षण हुषार होता. प्रोफेसर नाही आले तर तो क्लासही घ्यायचा. प्रिंसिपनीच त्याला तसं सांगितलं होतं.

त्याची शिकवण्याची, समजवण्याची पद्धत फारच छान आणि आकर्षक होती. तनुला ते फार आवडायचं. प्रसन्नलाही तनीषा विषयी ओढ वाटायची. तिचं सौंदर्य त्याला भुरळ घालायचं. कॉलेजमध्ये त्यांच्याबद्दल चर्चाही चालायची.

ही चर्चा तनीषाच्या घरापर्यंतही पोहोचली. आईबाबांच्या कानावर काही ती आलं असावं. ते विचारू लागले.

‘‘तनीषा, खरं काय ते सांग, हा प्रसन्न कोण आहे? शुभ्रा त्याच्या नांवानं तुला चिडवंत होती, ते का?’’

‘‘काही नाही गं आई. माझा सीनियर आहे. मला प्रॅक्टिकल्समध्ये अभ्यासात वगैरे मदत करतो. बाकी काही नाही. शुभ्राला तो भाव देत नाही म्हणून ती मला चिडवते.’’ तनीषानं सांगितलं.

‘‘एवढंच ना? मग ठीक आहे. पण अजून काही असलं तर मात्र मला विचार करावा लागेल हं!’’ आईनं तंबीच दिली.

‘‘आईनं असं का बरं म्हटलं? प्रसन्न खरंच माझ्या आयुष्यात इतका महत्त्वाचा आहे का?’’ तिनं स्वत:लाच प्रश्न केला.

‘‘इतका?’’ दुसरं मन उत्तरलं ‘‘तो तुझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचा आहे. जरा आरशात चेहरा बघ, त्याला बघताच कशी लाललाल होतेस तू? मनांतून तू सतत त्याची वाट बघत असतेस ना? तोही सतत तुझ्या मागावर असतो ना? मग? हे प्रेमच आहे गं बाई!!’’

म्हणजे आता शंकेला वाव नव्हता. एक दिवस ती लायब्ररीत अभ्यास करत असताना अवचित प्रसन्न येऊन थडकला.

‘‘अरे? तू इथं का आलास? काही खास बोलायचं आहे का?’’ तिनं विचारलं.

‘‘होय, खासच बोलायचंय. मला सांग. तुझ्या आयुष्यातस माझी जागा काय आहे?’’ प्रसन्नच्या आवाजात उतावळेपणा होता.

‘‘असं का विचारतो आहेस? माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे हे वेगळ्यानं सांगायला हवं का? तुझ्या विना माझं अस्तित्त्वच नाहीए रे. प्रसन्न आहे तर तनीषा आहे. झाडाला बिलगलेल्या वेलीला सांगावं लागतं का की तिच्या जीवनात त्या झाडाचं काय महत्त्व आहे ते?’’ तनीषा बोलून गेली अन् मग जीभ चावून गप्प बसली. मनांतच म्हणाली, ‘‘देवा रे, मी काय बोलून गेले…प्रसन्नला काय वाटेल? मी कित निर्लज्ज आहे असं वाटेल ना त्याला?’’

‘‘बोल बोल, तनु, गप्प का झालीस? शेवटी खरं काय ते तुझ्या तोंडून निघालं. मला वाटंत होतं पण खात्री नव्हती. तुझ्या तोंडून ऐकलं अन् खात्री पटली.’’ त्यानं क्षणांत तिला मिठीत घेतलं अन् तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तनीषानं स्वत:ला सोडवून घेतलं अन् तिथून धूम ठोकली. लाजेनं लालेलाल झाली होती ती.

आता तर सगळे उघडच म्हणायचे यांची जोडी फारच छान आहे. जणू एकमेकांसाठीच आहेत दोघं. त्यांचं प्रेम आईवडिलांनाही जाणवलं होतं. त्यांचं लग्न करून द्यावं असं वाटत होतं. प्रसन्नलाही पुण्यात लेक्चरर शिप मिळाली होती. दोन्ही घरातून होकार होता. दोघंही आनंदात होती पण प्रसन्नच्या आजीनं दोघांची पत्रिका जुळवण्याची टूम काढली अन् दुर्दैवानं तनीषाला मंगळ निघाला.

तनीषाच्या आईवडिलांचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यांनी कधी पत्रिका वगैरे केलीच नव्हती. त्यांना या सगळ्या अंधश्रद्धा वाटत होत्या पण प्रसन्नची आजी मात्र हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम होती. प्रसन्न तिचा एकुलता एक नातू अन् घराण्याचा वारस होता. खरं तर तो शिकलेला होता. त्याला तनीषाखेरीज इतर कुणाही मुलीशी लग्न करायचं नव्हतं. तो ही अडून बसला की तनीषा खेरीज तो कुणाशीही लग्न करणार नाही.

तनीषाला ही गोष्ट कळली तेव्हा तिनंच हे लग्न मोडण्याचं ठरवलं. ‘‘हे बघ प्रसन्न, जर आपल्या लग्नांमुळे तुझ्या जिवाला धोका संभवंत असेल तर मी तुला या बंधनातून मुक्त करते. मला तुझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढायचं आहे. फक्त तुला मिळवणं किंवा त्यासाठी लग्न करणं याला काय अर्थ आहे? तुला काही झालं तर मी स्वत:ला क्षमा करू शकणार नाही…’’ तनीषानं म्हटलं.

प्रसन्नला धक्काच बसला. आश्चर्यानं त्यानं विचारलं, ‘‘आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतोय तर या असल्या गोष्टींवर आपण विश्वास का ठेवायचा? कुठल्या तरी काल्पनिक भयानं तू पाऊल मागे का घेते आहेस? तुझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही का? बी लॉजिकल.’’

तनीषा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. तिनं प्रसन्नच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण प्रसन्ननं आपल्या नावांची हिऱ्याची अंगठी तिच्या डाव्या हाताच्या तर्जीत घातली अन् तो म्हणाला, ‘‘ही अंगठी आपल्या साखरपुड्याचं प्रतीक आहे. मी तुझ्या होकाराची वाट बघेन.’’ अन् मागे वळून बघता तो तिथून निघून गेला.

लवकरच तो नव्या नोकरीत रूजू झाला. तनीषानं त्याला भेटणं कमी केलंच होतं, आता फोनवरचा संपर्कही कमी केला. प्रसन्नला भेटल्यावर कदाचित आपला निश्चय बारगळेल अशी तिला भीती वाटत होती. प्रसन्न मात्र तिची वाट बघत होता. तनीषालाही कॉलेजात नोकरी मिळाली. तिनं स्वत:ला कॉलेजच्या इतर व्यापात गुंतवून घेतलं.

प्रसन्नला कॅनडाची एक फेलोशिप मिळाली. तो दोन वर्षांसाठी तिकडे गेला अन् मग तिथलीच एकेक कामं मिळत गेली म्हणून त्याचा कॅनडामधला मुक्काम वाढतच गेला. कधीतरी फोन, कधी तरी व्हॉट्सअॅपवर बोलणं व्हायचं, ते ही कमी कमी होत गेलं अन् एक दिवस शुभ्रानं तिला त्याच्या लग्नाची बातमी दिली.

ज्या आजीमुळे प्रसन्न तनीषाचं लग्न मोडलं होतं ती मृत्युशय्येवर होती अन् तिला प्रसन्नला वरवेषात बघायचं होतं. नातसून बघायची होती. शेवटी तिच्या इच्छापूर्तीसाठी प्रसन्ननं लग्नं केलं होतं. हे ऐकून मात्र तनीषाचे डोळे भरून आले. प्रसन्ननं तिच्या बोटात घातलेल्या अंगठीमुळे ती स्वत:ला त्याची वाग्दत्त वधू समजत होती. प्रसन्न तर आजीची इच्छा धुडकावून तिच्याशी लग्न करायला तयार होता. तिनंच नकार दिला. आता रडून काय होणार? पण तिला तेही मान्य होईना?

‘‘नाही, मी त्याची अन् तो माझा आहे. त्याचं लग्न कुणा बरोबरही झालं तरी माझ्या बोटातली अंगठी त्याच्या प्रेमाची खूण आहे.’’ तिनं स्वत:लाच समजावलं यापुढे ती एकटीच जगणार होती.

तिचा निश्चय ऐकून आई वडिलांनी तिच्या भावाचं लग्न करून दिलं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती भावासोबत राहत होती. पण वहिनीला हळूहळू तिचं राहणं खटकू लागलं. ती वेडवाकडं बोलायची, टोमणे मारायची. तनीषा आजारी पडली तव्हा वहिनीला तिची सेवा करावी लागली तेही ती बोलून दाखवायची पण वहिनीची तिन्ही बाळंतपण तनीषानं निस्तरली होती, तिचे माहेरचे फिरकलेही नव्हते, हेही सोयीस्करपणे विसरली होती. वहिनीला निवांत रात्रीची झोप मिळावी म्हणून ती मुलांना आपल्याजवळ झोपवंत होती. सकाळी सगळा स्वयंपाक आटोपून कॉलेजला जायची. आल्यावरही सतत बाळाच्या व बाळंतिणीच्या तैनातीत असायची. पगारातली ठराविक रक्कम वहिनीच्या हातात दिल्यावरंच ती आपला खर्च करायची.

शेवटी भावानं वेगळा फ्लॅट घेतला. बहीण एकटी पडेल याची काळजी त्याला वाटली नाही. आता तर ती अगदी एकटी होती.

दाराची घंटी वाजली तशी ती भानावर आली. दार उघडलं तर दारात अनुज होता. बहिणीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका द्यायला आला होता. तिनं पत्रिका बघितली. नीरजा+प्रतीक अशी नावं वाचली. वराच्या वडिलांचं नांव प्रसन्न दीक्षित बघून तिच्या तोंडून आश्चर्य आनंदाचा चित्कार बाहेर पडला…हा प्रतीक म्हणजे माझ्या प्रसन्नचा मुलगा आहे का? नसेलही…हा दुसराच कुणी प्रसन्न दीक्षित असू शकतो…तिनं स्वत:लाच समजावलं.

‘‘मावशी, लग्नाला नक्की या हं!’’ तीन तीनदा बजावून अनुज निघून गेला.

आज ती खूप वेळ स्वत:लाच आरशात निरखंत होती. खरंच ती म्हातारी झाली होती? शक्यता आहे. परिस्थितीशी झुंज घेताना दमछाक होतेच. काळचक्र मागे फिरवता आलं असतं तर तिनं प्रसन्नला घट्ट मिठी मारली असती.

‘‘ये रे प्रसन्न, तुझा तनू आजही तुझी वाट बघतेय.’’ एक नि:श्वास तिच्या तोंडून बाहेर पडला.

आज पंचवीस तारीख. सायंकाळी नीरजाची वरात येणार आहे. जाऊ की नको जाऊ, या मानसिक द्वंदात तिनं काहीच तयारी केली नव्हती. वधूसाठी काही भेट वस्तू ही घेतली नव्हती. वेळेवर पाकिटात घालून कॅश देता येईल असं तिनं ठरवलं.

बँडच्या आवाजानं ती पुन्हा भानावर आली. वरात आली वाटतं. तिनं पटकन आवरलं. केसांचा सुंदर अंबाडा घातला. निळ्या रंगाची सिल्कची साडी, त्यावर मोत्याचे दागिने, बोटात प्रसन्ननं दिलेली अंगठी होतीच. प्रसन्नचं प्रेम होतं ते.

सगळा बंगलाही नववधूसारखा नटला होता.

वरात दारात आली होती. तिची नजर नवरदेवाच्या वडिलांकडे गेली. प्रसन्नच होता. आपल्या व्याह्यांनी केलेल्या विनोदावर खूप खूप हसंत होता. तनीषाची नजर तिच्या प्रसन्नला शोधंत होती, तो कुठंतरी हरवला  होता. डोक्यावरचे अर्धे पांढरे, अर्धे काळसर केस, कल्ल्यांजवळ पांढरे झालेले केस त्याचं वय सांगत होते. थोडं सुटलेलं पोट सुखसमृद्धीचं प्रतीक होतं…छे! हा माझा  प्रसन्न नाहीए. तिनं स्वत:लाच समजावलं. तेवढ्यात मैत्रिणीच्या घोळक्यातली सुंदर नटलेली नववधू हातात वरमाळा घेऊन येताना दिसली. तनिषानं झटक्यात निर्णय घेतला अन् पुढे होऊन नीरजाच्या बोटात आपली अंगठी घातली. नीरजाला काही कळायच्या आत ती तिथून निघाली. आता तिचं तिथं काहीच काम नव्हतं.

जेव्हा प्रसन्न सुनेच्या बोटात ती अंगठी बघेल तेव्हा त्याला माझी आठवण येईल का? या विचारातच तिला गाढ झोप लागली. आता प्रसन्न कधीच परत येणार नव्हता. आता तिला कुणाविषयी कसलीच तक्रार नव्हती. तिचं मन शांत शांत झालं होतं.

एक धाडसी निर्णय

कथा * शकिला हुसेन

अपघाताची बातमी समजताच जुबेदाला धक्का बसला. इमरानशी लग्न होऊन फक्त तीन वर्षच झाली होती. इमरानच्या बाइकला एका ट्रकनं धडक दिली होती. घरातील सर्व लोकांबरोबर जुबेदाही हॉस्पिटलमध्ये गेली. डोक्याला जबर दुखापत झाली होती. इतरही खूप जखमा होत्या. डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले. त्यासाठी एक लाख रूपये हवे होते. सासऱ्यांना घेऊन जुबेदा घरी आली. एक लाखाचा चेक भरून बँकेतून पैसे काढले. परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य पार उध्वस्त झालं होतं. इमरान हे जग सोडून गेला होता. जुबेदा हे कळताच बेशुद्ध पडली. हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार आटोपेपर्यंत पाच सहा तास गेले.

इमरानचं शव घरी पोहोचताच शवयात्रा म्हणजे जनाजाची तयारी सुरू झाली. जुबेदा शुद्धीवर आली होती पण तिला काहीच समजत नव्हतं. तिची थोरली बहिण कहकशा तिच्याजवळ होती. तिच्या नवऱ्याबरोबर ती जुबेदाच्या घरी आली होती. बाहेर जनाजा उचलला गेला अन् आत जुबेदाच्या आत्येसासूनं लोखंडी अडकित्त्यानं जुबेदाच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरूवात केली. कहकशानं त्यांना अडवून म्हटलं, ‘‘का फोडताय तिच्या बांगड्या?’’

‘‘आमच्या खानदानाची रीत आहे तशी. नवऱ्याचा जनाजा उठताच त्याच्या विधवेच्या बांगड्या फोडून तिचे हात भुंडे केले जातात.’’ आतेसासू म्हणाली.

जुबेदाची अवस्था बघून कहकशा म्हणाली, ‘‘तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा. मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते.’’

पण म्हातारी आत्येसासू हटूनच बसली. ‘‘बांगड्या फोडण्याची पद्धत असते.’’

शेवटी जरा कठोरपणे  कहकशां म्हणाली, ‘‘तुमचा उद्देश विधवेचे हात भुंडे करणं एवढाच आहे ना? मग बांगड्या काढल्या काय अन् फोडल्या काय? काय फरक पडतो?’’ तिनं जुबेदाच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळूवारपणे उतरवून घेतल्या अन् तिच्या सोन्याच्या दोन दोन बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या.

यावरूनही आत्येसासूनं तारांगण घातलं. पुन्हा कहकशाने त्यांची समजूत घातली, ‘‘तुमच्या घराण्यात बांगड्या फोडण्याची पद्धत आहे, हे मान्य. पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत. त्या फोडतही नाही कुणी, तर राहू देत ना तिच्या हातात.’’

फुणफुणंत सासूबाई गप्प बसल्या.

जुबेदाला विधवेचा वेष म्हणून पांढरा सलवार सूट घालायला लावला. मग त्यावरून एक पांढरी चादर पांघरून तिला सासूनं एका खोलीत नेऊन बसवलं. ‘‘आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही. कारण तू आता इद्दतमध्ये आहेस (इद्दत म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला साडे चार महिने एकांतवासात काढावे लागतात. या काळात ती कुठल्याही पुरूषाच्या समोर येत नाही, संपर्कात येत नाही.)’’

जुबेदालाही खरं तर एकांत हवाच होता. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. विश्रांतीची गरज होती. कहकशानं तिला अंथरूणावर झोपवली. ती हलके जुबेदाला थोपटू लागली. तिला समजावतही होती.

जुबेदाच्या अश्रुंना खळ नव्हता. तिला तिचे मागचे दिवस आठवत होते.

इमरान पती म्हणून खूप प्रेमळ, समजूतदार अन् हौशी होता. लग्नानंतर दोघांनीही एक महिन्याची रजा घेतली होती. हनीमून नंतरचे दिवस नातलगांकडे मेजवान्या व फिरण्यात भराभर संपले. दोघंही आपापल्या नोकरीवर रूजू झाले.

इमरान सकाळी नऊला घरातून बाहेर पडत असे. त्यानंतर जुबेदाला शाळेसाठी निघावं लागायचं. अजूनपर्यंत जुबेदाला स्वयंपाकघरात काम करावं लागलं नव्हतं. एकदाच फक्त तिनं खीर बनवली होती. आज ती प्रथमच स्वयंपाकघरात आली. तिनं भराभर पराठे तयार केले. जावेनं ऑमलेट बनवलं. नाश्ता होता होताच खूप वेळ गेला. जेवणाचा डबा करायला वेळच नव्हता. दोघंही नाश्ता करून कामावर गेले.

सायंकाळी दोघं घरी परतल्यालर जुबेदानं तिच्यासाठी व इमरानसाठी चहा केला. इतरांचा चहा आधीच झाला होता. चहा घेता घेता ती दुसऱ्या दिवशी स्वयपाक कसा, काय, केव्हा करायचा याचं प्लॅनिंग करत असतानाच सासूचा तोफखाना सुरू झाला. ‘‘सगळा दिवस घराबाहेर राहायचं. घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना? एकटी बिचारी रूमा काय काय करेल? दोन लहान मुलं आहेत तिला. त्यांनाही सांभाळायचं असतं. शिवाय आम्हा म्हाताराम्हातारीचं बघायचं असतं. उद्यापासून सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा. समजलं का?’’

जुबेदा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. सर्वांसाठी चहा आणि पराठे तयार केले. रूना भाभीनंही कामात मदत केली. पटकन् जुबेदानं एक भाजी चिरून फोडणीला घातली. थोड्या चपात्या करून दोघांचे लंचबॉक्स भरून घेतले. इतकी घाई केली तरी उशीर झालाच. असंच मग रोज व्हायचं. कधी वरण शिजवायला वेळ कमी पडायचा. कधी सर्वांसाठी चपात्या करायला जमायचं नाही. त्यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायची तरीही दर दोन दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचंच. शेवटी इमराननं एक स्वयंपाकीण स्वयंपाकासाठी नेमली. तिचा पगार जुबेदा द्यायची. आता जुबेदा अन् रूना दोघींनाही बराच रिलीफ मिळाला. सकाळचा चहा, नाश्ता व ऑफिस, शाळेचा डबा दोघी मिळून करायच्या. सकाळ सांयकाळचा स्वयंपाक बाई करायची. त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं.

प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचारांची होती. तिला जुबेदाच्या नोकरीमुळे येणारा पैसा तर हवा होता, पण जुबेदाची नोकरी मात्र आवडत नव्हती. सासऱ्यांची सर्व पेंशन तिच्या हातात असायची. स्वत:साठी ती भरपूर पैसा खर्च करायची. घरखर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटे. सतत पैशाच्या नावानं रडगाणं गायची. इमरान आणि सुभान घराचा खर्च बरोबरीनं करायचे. जुबेदा सणावाराला घरातील सर्वांसाठी फळफळावळ, मिठाया वगैरे आणायची. प्रत्येकासाठी त्याला आवडेल, उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आणायची. त्यावेळी सासू खूष असायची. तरीही जुबेदाला घालूनपाडून बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती.

जुबेदा नाजुकशी आणि सुंदर होती. शिक्षित कमावती होती. इमरान तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा तेच अम्माला आवडत नसे.

जुबेदाला सर्व कळत होतं. पण इमरानच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा. ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती. सासूला कधी एका शब्दानं उलटून बोलत नसे. जावेशीही प्रेमानं वागे, तिला यथायोग्य मान देई. रूना तशी बरी होती, पण जुबेदाचं सौंदर्य, शिक्षण, नोकरीमुळे हातात असणारा पैसा, आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्शा असायची. ती मनातून तिचा हेवा करायची. कारण सुभानकडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा.

आता अम्मानं एक नवाच सूर लावला होता. लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. अजून मूळबाळ नाही झालेलं, यात जुबेदाचा काहीच दोष नव्हता पण सासू सतत घालून पाडून बोलायची. अपमान करायची. ‘‘रूनाला पाच वर्षांत दोन मुलं झाली. ही एक दुल्हन बघा…वांझ आहे की काय. वाळलेल्या खोडासारखी…फळ नाही, फूल नाही…घरात मुलं खेळायला हवीत. त्याशिवाय घराला शोभा नाही.’’

सासूनं स्वत: कधी रूनाची मुलं सांभाळली नव्हती. तिला मदतही करत नव्हती. व्यवस्थित थोडं फार शिवण केलं तर किंवा मुलांनी खूपच आग्रह केला तर त्यांच्यासाठी एखाद्या खास पदार्थ शिजवणं या व्यतिरिक्त ती काहीही करत नसे. सगळा वेळ शेजारी पाजारी कुचाळक्या करण्यात अन् फुकटचे सल्ले देण्यातच जायचा.

अम्माचे टोमणे ऐकून इमरानही कंटाळला. तो जुबेदाला घेऊन एक्सपर्ट डॉक्टरकडे गेला. दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी निर्वाळा दिला. ‘‘दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत. काहीच प्रॉब्लेम नाहीए. मूल नक्की होईल, उगीच टेन्शन घेऊ नका.’’

दोन महिने अम्मा बरी शांत होती. मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरूवात झाली. ‘करामत पीर’कडे जायचं. त्या पीराचा एक एंजट अधूनमधून अम्माकडे यायचा. आपल्या परीनं पीर बाबांचा महिमा समजावून सांगायचा. दरवेळी अम्माकडून भरपूर पैसे पीर बाबाचा ‘चढावा’ म्हणून घेऊन जायचा.

अम्मा सतत ‘करामती पीर’ची पिरपिर चालू ठेवायची. जुबेदा लक्ष देत नसे. दुर्लक्ष करायची.

त्यादिवशी कसली तरी सुट्टी होती. सगळे घरीच होते. सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून घरगुती गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात अम्मानं हुकुम दिला, ‘‘चल, जुबेदा, पटकन आवर. आज आपण करामती पीरबाबाकडे जाऊयात. खूप दिवस सहन करतेय तुला मूल नसणं. पीरबाबा एक ताईत देतील. त्यामुळे तुला मूल होईल. आज तुला चलावंच लागेल.’’

हलक्या आवाजात जुबेदानं म्हटलं, ‘‘अम्मा, माझा विश्वास नाहीए या सगळ्यावर. मुख्य म्हणजे पीरबाबा ताईत देतील, मला मूल होईल यावर तर अजिबातच विश्वास नाहीए माझा.’’

हे ऐकताच अम्माचा पारा एकदम चढला. संतापून ती किंचाळायला लागली, ‘‘या शिकलेल्या मुलींचा हाच आडमुठेपणा आवडत नाही मला. आता या शहाण्या पोरीचा पीरबाबावर विश्वास नाहीए. अगं, त्या शेजारच्या सकीनाला, पीरबाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत. त्या सलामत मुलीला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं, तिलाही पीरबाबांमुळे मुलं झालीत. बाबाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे ताईत देतो त्यानं हमखास मुलगाच होतो. तू चल, तुलाही होईल.’’

आता जुबेदा जरा ठामपणे म्हणाली, ‘‘अम्मा माझा जर विश्वासच नाहीए या गोष्टींवर तर मी का जायचं? माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे. डॉक्टरांनी खात्री दिलीय की माझ्यात दोष नाहीए. मला मूल नक्की होईल तर मी इतरांचं का ऐकू? तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टरला भेटून, सर्व तापसण्या करून आलो ना? शेवटचं सांगते, पीरबाबाकडे जाणार नाही.’’

अम्मानं रागानं इमरानकडे बघितलं. तो प्रेमानं अन् शांतपणे अम्मीला म्हणाला, ‘‘अम्मी, माझाही विश्वास नाहीए या सगळ्यांवर. जुबेदावर मी अजिबात बळजबरी करणार नाही. तिला नकोय तर तिला नेऊ नकोस.’’

झालं! अम्माला तर अश्या मिरच्या झोंबल्या. इमरान-जुबेदा एकीकडे आणि अख्ख कुटुंब एकीकडे. सगळेच ओरडू लागले. शिव्या देऊ लागले. जुबेदा उठली अन् आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. सगळेच तिच्याशी अबोला ठेवून होते. एकट्या इमरनाचा आधार होता. जुबेदा बराच वेळ शाळेत घालवायची. घरात मूकपणे तिची ठरलेली कामं करायची. उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची. पण तिनं एका शब्दानं कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही. मुकाट्यानं सगळं सहन केलं. दीड दोन महिन्यांत पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं. दिवस रात्रीचं चक्र सुरूच होतं…

कहकशानं जुबेदासाठी गरम दूध आणलं होतं. आपल्या विचारातून जुबेदा भानावर आली. कहकशानं तिला दूध आणि ब्रेडच्या दोन स्लाइस बळेबळे खायला लावल्या. दोन दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते. घरात स्वयंपाक होत नव्हता.

तिसऱ्या दिवशी सियूम होता (मृत्यूनंतरचा तिसरा दिवस). त्या दिवशी घरी स्वयंपाक होतो. सगळे नातलग व मित्र आणि परिचित जेवण करतात. सियूमचा कार्यक्रम खूपच दणक्यात झाला.

सगळा दिवस जुबेदाला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला. पुन्हा पुन्हा इमरानचा एक्सिडेंट, त्याचा मृत्यू, त्याच्या जखमा, रडणं, त्याला मूल नसण्याचे उल्लेख, तिच्याबद्दलची खोटी सहानुभूती. सियूमच्या भव्यपणाची, उत्तम स्वयंपाकाची प्रशंसा…या सगळ्यांमुळे जुबेदा फार वैतागली. थकून गेली. तिला वाटत होतं की इथून कुठंतरी दूर पळून जावं.

तिला विश्रांतीची गरज आहे हे कहकशाच्या लक्षात आलं. ती जुबेदाला तिच्या खोलीत नेऊ लागली तशी सासू कडाडली, ‘‘अजून तिला इथंच बसू देत. आज पूर्ण दिवस बायका पुरसा द्यायला (सहानुभूती दाखवायला) येतील. तिनं इथंच बसायला हवं.’’

‘‘तिला घेरी येतेय. तिला बसवत नाहीए. मी तिला खोलीत नेते. थोडी पडली की बरं वाटेल तिला.’’ कहकशांनं नम्रपणे म्हटलं.

त्यानंतर एक महिन्याने फारोहा झाली. फारोहा म्हणजे जवळचे नातेवाईक पक्वान्नांचं जेवण आयोजित करतात. या कार्यक्रमालाही पन्नाससाठ लोक होतेच. खर्च भरमसाट होत होता. जुबेदा मुकाट्यानं बघत होती.

कहकशा त्यानंतर स्वत:च्या घरी गेली. सियमनतंर ती घरी गेली अन् फारोहाच्यावेळी पुन्हा आली. धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती.

इमरानला जाऊन आता सव्वा महिना झाला होता. त्या दिवशी पांढरा सूती सलवार सूट घालून जुबेदा शाळेत जायला तयार झाली. तिला बघून सासू व आत्येसासू गळा काढून रडायला लागल्या. तिला दूषणं देऊ लागल्या. ‘‘किती नालायक आहे, कसली अवलक्षणी आहे…इद्दत अजून पूर्ण झाली नाही अन् घराबाहेर पडते आहे.’’

सगळा कालवा ऐकून सासरे व थोरला दीरही वाट अडवून उभे राहिले. सासरे म्हणाले, ‘‘तू शाळेत जाऊ शकत नाहीस. घराबाहेर पडायची परवानगी नाहीए. मी मौलाना साहेबांना बोलावतो. तेच तुला समजावून सांगतील.’’

मौलाना आले. जुबेदाला एका पदद्याआड बसवलं गेलं. कहकशाही तिच्याजवळ बसली. मौलानांनी एक मोठं भाषण झाडलं, त्याचा मथितार्थ असा, ‘‘पति निधनानंतर स्त्री साडेचार महिने कुणाही बाहेरच्या पुरूषाच्या संपर्कात यायला नको. तिचं कुणा बाहेरच्या पुरूषाशी संभाषण नको. भडक, रंगीत कपडे घालायचे नाहीत. खोलीबाहेर पडायचं नाही.’’

मौलानांचं बोलणं ऐकून सर्वांनाच चेव आला. सगळेच एकदम बोलू लागले. पाच मिनिटं सर्वांना बोलू दिल्यावर जुबेदानं कडाडत्या आवाजात म्हटलं, ‘‘एक मिनिट! मला काही सांगायचंय, ते नीट ऐकून घ्या.’’

खोलीत तिच्या आवाजानं एकदम शांतता पसरली. जुबेदा म्हणाली, ‘‘मौलाना साहेब, मी जगातील सर्वात प्रसिद्धा अन् जाणत्या आलिमना आणि इस्लामचे फार मोठे स्कॉलर यांना यू ट्यूबवर प्रश्न केला होता की इद्दतच्या काळात स्त्री घराबाहेर पडू शकत नाही का? त्यांनी जे उत्तर दिलं ते मी रेकॉर्ड करून ठेवलंय. तुम्ही ही ऐका. उत्तर असं आहे, ‘‘अगदी नाईलाज असेल तर स्त्री घराबाहेर पडू शकते. काही सरकारी किंवा कोर्टाचं काम असेल तरीही तिनं बाहेर पडायला हरकत नाही. जर ती स्वत: कफील असेल (कमवती/नोकरी करणारी) तर तिला बाहेर जायची परवानगी आहे. बुरखा पांघरून स्त्री घराबाहेर पडू शकते. त्या परिस्थितीत तिला साडे चार महिन्यांची इद्दत पूर्ण करणं गरजेचं नाहीए.

आलिम साहेबांचं हे वक्तव्य ऐकून एकदम शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही.

पडद्याआडून अत्यंत मर्यादशीलपणे पण पूर्ण आत्मविश्वासाने जुबेदा बोलली. ‘‘तुम्ही सर्वांनी आलिम साहेबांचा फतवा ऐकलाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मला नोकरीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे. माझा सरकारी नोकरी आहे. सव्वा महिन्याची रजा मला मिळाली होती. आता घरी राहणं शक्य नाही. गरज म्हणून आणि नाइलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल. माझी शाळा मुलींची शाळा आहे. तिथं प्रिसिंपलपासून शिपाईदेखील महिलाच आहेत. तेव्हा पुरूषांशी माझा संबंध येतच नाही. आलिम साहेबांच्या बयानानुसार मी नोकरीवर जाऊ शकते.’’

इतक्या मोठ्या माणसाच्या हुकुमाचा अनादर करणं मौलवींनाही शक्य नव्हतं. ते गप्प झाले. इतरही सर्व गप्प बसले. त्याच दिवशीपासून जुबेदानं बुरखा घालून घराबाहेर पडायला सुरूवात केली. शाळेत तिचा वेळ छान जायचा. विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय होती. स्टाफ व प्रिंसिपल तिला समजून घेत होते. तिच्या हिंमतीचं कौतुक करत होते. घर व शाळा दोन्ही आघाड्यांवर आता शांतता होती.

एक दिवस जुबेदा शाळेतून परतली, तेव्हा रूना भाभीचा चेहरा उतरलेला होता. डोळे रडून रडून सुजले होते. तिनं रूनाला काय झालं म्हणून विचारलं तर तिनं उत्तर दिलं नाही. पण त्या दिवसानंतर रूनानं जुबेदाशी बोलणंच बंद केलं. काय घडलंय ते जुबेदाला समजत नव्हतं. शेवटी एकदाचं सगळं उघड झालं. तो सुट्टीचा दिवस होता. ती सकाळचा नाश्ता आटोपून भाजी चिरत होती. त्यावेळी अम्मानं विषय काढला. ‘‘हे बघ जुबेदा, तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस. तुझं वय फक्त सत्तावीस वर्षांचं आहे. पहाडासारखं आयुष्य समोर आहे. कुणा पुरूषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील? आम्ही काय आज आहोत, उद्या नसू. हे जग फार वाईट आहे. तरूण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही. लांडग्यासारखे लोक टपलेले असतात. माझं म्हणणं ऐक अन् दुसरं लग्न करून घे.’’

मनातला संताप आवरत जुबेदानं शांतपणे म्हटलं, ‘‘अम्मा, माझ्या लग्नाचं सोडा, तुम्ही हीनाच्या (नणंदेच्या) लग्नाची काळजी करा. तिचं लग्नांचं वय होतंय.’’

सासू गोडीत म्हणाली, ‘‘जुबेदा, अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहोत. पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना? सुभान आहे ना? इमरानहून तीन चार वर्षच मोठा आहे तो. आपल्या धर्मात पुरूषाला चार बायका करण्याचा अधिकार आहेच आणि भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्मसंमत आहे. तुलाही त्याचा आधार होईल. मी सुभानशी बोलले आहे. तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. फक्त तू हो म्हण.’’

जुबेदा एकदम संतापलीच. ‘‘अम्मा, किती वाईट बोलताय तुम्ही? मला हे अजिबात मान्य नाही. सुभानभाईंकडे मी नेहमीच माझा मोठा भाऊ म्हणून बघत आले आहे. तेच नातं मी जपणार आहे. रूना भाभीचा संसार उध्वस्त करण्याचं पाप मी करणार नाही. त्यांचा सुखाचा संसार का म्हणून मोडायचा? यापुढे पुन्हा हा विषय काढू नका.’’ काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली. तिनं दार आतून लावून घेतलं. तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता. सासूचे शब्द पुन:पुन्हा डोक्यात घण घातल्यासारखे आदळत होते. ‘‘सुभान तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.’’ त्याला काय? सुंदर, कमी वयाची, कमावती बायको मिळाली तर तो नाही कशाला म्हणेल? हलकट कुठला, लाज नाही वाटत हो म्हणायला?

रूनासारखी समर्पित बायको, दोन गोजिरवाणी मुलं असताना पुन्हा लग्न का करावंसं वाटतं? रूना भाभी तिच्याशी का बोलत नव्हती, ते तिला आता समजलं. तिच्या आणि सुभानच्या लग्नाच्या गोष्टी ऐकून ती बिचारी दुखावली होती. घाबरलीही होती. इमरान गेल्यावर घरखर्च आता सुभानवरच होता. बेताचा पगार…त्यामुळे त्याची नजर जुबेदाच्या पगारावर असणार. काही वर्षात फ्लॅटही तयार होईल. त्यावरही हक्क सांगता येईल. तिला खरं तर सुभानची दयाच आली. कसा माणूस आहे हा? आईनं काहीही म्हटलं की मान डोलावतो…तिनं त्या क्षणी निर्णय घेतला. ती लग्न करणार नाही. आता तिला खूप विचारपूर्वक पुढलं पाऊल उचलावं लागणार आहे. कारण या लग्नामुळे या लोकांचा खूपच फायदा होणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असेल. सारा दिवस, सारी रात्र ती विचार करत होती.

शाळेच्या प्रिंसिपल मॅडमचा जुबेदाला खूप आधार वाटायचा. त्या अत्यंत हुशार, कर्तबगार, दूरदर्शी अन् सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या. जुबेदाविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मियता होती. जुबेदानं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला. थोडा विचार करून त्या म्हणाल्या, ‘‘मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर रहावंस हे उत्तम. त्यामुळे तू हे नको असलेलं लग्न टाळू शकशील. आपल्या इथून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक खूप छान मुलींची शाळा उघडली आहे. त्यांना तरूण, उत्साही शिक्षिका हव्या आहेत. तिथली प्रिंसिपल माझी कलीगच होती. तुला होस्टेल वॉर्डनचा विशेष पगार, राहायला क्वार्टर आणि जेवायला मेसची व्यवस्था असेल. समवयस्क टीचर्सही भेटतील. तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल. मी तुझं नाव सुचवते त्यांना. सोबत एक पत्रही देईन. तीन चार वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील. विचार कर आणि मला सांग.’’

जुबेदाला ही कल्पना पटली. तिनं बहिणीचा सल्ला घेतला. तिनंही संमती दिली. तिनं लगेच होकार कळवला. प्रिसिंपलनं ट्रान्सफर फॉर्म मागवला. जुबेदाकडून भरून घेतला. उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवालाही गेला.

कहकशालाही हा लग्नाचा विषय अजिबात आवडला नव्हता. म्हणूनच इथून जाण्याचा विचार तिनं उचलून धरला. तिनं म्हटलं, ‘‘जुबेदा, तुझी जॉइनिंग ऑर्डर आल्याबरोबर मला कळव. मी अरशदबरोबर येईन अन् कारनं तुला तुझ्या मुक्कामी सोडून, तुझं सामान तिथं बसवून आम्ही परत येऊ.’’

जुबेदानं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती. शाळेतही याबाबत फारसं कुणाला ठाऊक नव्हतं. घरात ती अगदी नॉर्मल वागत होती. तिला बरोबर फारसं सामानही न्यायचं नव्हतं. कपड्यांची एक सूटकेस, महत्त्वाची कागदपत्र अन् इतर काही सामान अशा दोन सूटकेसेस तिनं भरून घेतल्या होत्या. पंधरा दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली. शाळेनं तिला रिलीव्ह केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच कहकशा अन् अरशद गाडी घेऊन आले. नाश्ता आटोपल्यावर तिनं सासूसासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं. शाळेच्या प्रिंसिपलही आल्या होत्या. त्यांनीही तिला आजच निघायला हवं, उद्या जॉइन करायचंय हे पटवून दिलं.

ट्रान्सफरबद्दल ऐकून सगळेच दचकले. शॉकच बसला. सुभान म्हणाला, ‘‘ तू जाऊ नकोस, मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो. माझ्या ओळखी आहेत.’’

सासूसासरेही समजूत घालू लागले. पण तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मला प्रमोशन मिळालंय. तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे. माझा निर्णय ठाम आहे. तुम्ही काळजी करू नका.’’

जुबेदाला ठाऊक होतं, हा निर्णय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. एक घाव की दोन तुकडे. उगीच भिजत घोंगडी घालायची नाहीत. तिचा आत्मविश्वास अन् शांत संयमी वागणं बघून सगळे चकित झाले होते.

रूना भाभीची गळाभेट घेऊन तिनं म्हटलं, ‘‘भाभी, तुम्ही माझ्याबद्दल फार चुकीची कल्पना करून घेतली. तुमचा संसार मी कधीच उधळणार नव्हते. मीही एक स्त्री आहे. तुमची व्यथा वेदना मी समजू शकते. मी आता इथून दूर जाते आहे तुम्ही आनंदात राहा.’’

‘‘मला क्षमा कर जुबेदा. माझं फार चुकलं. पण तुझं एकटेपण मलाही कळतंय गं!’’

माझी काळजी करू नका भाभी. मी कामात स्वत:ला गुंतवून घेईन. नवं काही शिकेन. तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेन अन् मी लग्नच करणार नाही असंही नाही, पण मला समजून घेणारा, सहकार्य करणारा चांगला कुणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन. सध्या तरी मी नव्या कामावर मन केंद्रित करणार आहे. मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल.

सगळ्यांचा निरोप घेऊन जुबेदा आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली. एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं.

अलिखित नियम

कथा * प्रा. रेखा नाबर

दादा अमेरिकेला जाणार हे समजल्यावर सर्वांपेक्षा म्हणजे अगदी त्याच्यापेक्षासुद्धा जास्त आनंद मला झाला. का माहिती आहे? मला आता त्याचे जुने कपडे, बुट वापरावे लागणार नाहीत या कल्पनेने. तोपर्यंत कायम मी त्याचे वापरून जुने झालेले कपडे, बूट आणि पुस्तकेसुद्धा वापरत होतो. फक्त दिवाळीला आई मला कपडे घेई. जुन्या वस्तू वापरणे मला नकोसे होई. त्याबद्दल मी तक्रारसुद्धा करत असे.

‘‘आई, कायम मी दादाच्या जुन्या वस्तू का वापरायच्या?’’

‘‘बाळा, तो तुझ्याहून दोनच वर्षांनी मोठा आहे. तुम्ही मुलं भराभर वाढता. एक वर्ष वापरले की कपडे मला घट्ट होतात, मग त्याला नवीन कपडे शिवून आधीचे कपडे मी स्वच्छ धुवून ठेवते. ते नव्यासारखेच असतात. मग वापरायला काय हरकत आहे. बूटांचंही तसंच आहे ना? पुस्तकं म्हणशील तर अभ्यासक्रम बदलला नाही तर तिच पुस्तकं तुला उपयोगी पडतात. बाईडिंग करून किंवा छान कव्हर घालून देते की नाही तुला? उगाच कशाला पैसे खर्च करायचे? शहाणा आहे ना माझ्या सोन्या? तुलासुद्धा घेऊ नवीन वस्तू.’’

असेच मधाचे बोट लावून आई मला नेहमी गप्प करीत असे. मला कधीच नवीन वस्तू वापरायला मिळाल्या नाहीत. शाळेच्या पहिल्या दिवशी इतरांचे नवे कोरे युनिफॉर्म, नवी कोरी पुस्तके, त्यांचा निराळा गंध यांनी मी हरखून जाई. आतल्या आत हिरमुसला होई. मला त्यांचा हेवा वाटे. या आनंदापासून मी कायमचा वंचित राहणार ही बोच सलत राही. जुनी पुस्तके वापरण्याचा मला इतका वीट आला होता की एस.एस.सी. झाल्यावर मी सायन्सला अॅडमिशन घेतलं. कारण त्यावर्षी दादा बारावी कॉमर्सला होता. अकरावी सायन्सला मला प्रथमच नवी पुस्तके वापरण्यास मिळाली. परंतु तिथेही माझे नशीब आडवे आले. केमिस्ट्री प्रॅक्टिकलला मला चक्कर येऊ लागली. अंगावर पुरळ उठू लागली. घरगुती औषधांचे उपाय थकल्यावर बाबांनी मला डॉक्टरकडे नेले.

‘‘बाबासाहेब, याला केमिकल्सची अॅलर्जी आहे. केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स जमणार नाहीत त्याला.’’

‘‘म्हणजे हा सायन्सला शिकू शकत नाही.’’

‘‘बरोबर आहे तुमचं.’’

आर्ट्सला स्कोप नाही या सबबीवर बाबांनी मला कॉमर्सला पाठवलं. पुनश्च येरे माझ्या मागल्या. दादाची अकरावीची पुस्तके, गाईड्स यांच्या सहाय्याने अभ्यास केला. लहान केल्याबद्दल निसर्गाला मी मनोमन दोष देऊ लागलो. दादा बी. कॉम झाल्यावर एम.बी.ए.ला गेला. मी सीएची कास धरली. मला वाटले, ‘‘चला, जुन्याची यात्रा पुस्तकापुरती तरी संपली. कपडे आहेतच पाचवीला पुजलेले. एम.बी.ए. झाल्यावर दादाला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच एका विख्यात मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. त्याच कंपनीने त्याला अमेरीकेला पाठवण्याचे ठरवले होते. त्याच्या जाण्याची मीसुद्धा उत्साहाने तयारी करत होतो. तो अमेरिकेला गेला. मी सीए यशस्वीरित्या पास झालो. मला नोकरीचे वेध लागले. इंटव्ह्यूसाठी बोलावणीसुद्धा येऊ लागली.’’

‘‘आई, मला आता इंटरव्ह्यूला जावं लागणार. नवीन कपडे शिवायचे म्हणतोय.’’

आईने मला दादाचे कपाट उघडून दाखवले. कपड्यांची चळतच होती. ‘‘हे बघ, तुझ्या दादाचे केवढे कपडे आहेत ते. बहुतेक तुझ्याचसाठी ठेवले असणार. एक दोनदाच वापरले असावेत. सूटसुद्धा आहेत. कोरे करकरीत असल्यासारखेच वाटतायत. तरीपण तुला पाहिजे असले तर लाँड्रीत देऊन आण.’’

आईच्या बोलण्याचा मतितार्थ मला कळला. मनातल्या मनात मी कपाळावर हात मारला. दादा अमेरिकेला गेला तरी जुन्याचे लेणे माझ्यासाठी ठेवून गेला होता. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मी यशस्वी झालो. मला नोकरी मिळाली. आईने आनंद व्यक्त केला. ‘‘बघितलंस? दादाच्या कपड्यांचा पायगुण? पहिल्या फटक्यात नोकरी मिळाली, आनंद होईल त्याला.’’

एकतर जुन्या वस्तू वापराव्या लागतात. त्याचे दु:ख आणि वर आईचे असे ताशेरे. म्हणजे माझ्या गुणवत्तेला मोलच नाही. आईचा दादाकडे असलेला कल माझ्या मनात सल धरू लागला होता. या जुन्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा जोरकस प्रयत्न मी पहिल्या पगारातच केला. चांगले चार कपड्याचे जोड शिवून घेतले.

अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यावर दादाला मुली सांगून येऊ लागल्या. थोडक्यात वधूपित्यांच्या उड्याच पडत होत्या. महिन्याभराने तो भारतात हजर झाला. त्याला लग्न करूनच जायचे होते. आम्ही निवडलेल्या चार मुलींमध्ये तसूभरही कमतरता नव्हती. तो स्वत: सर्वांना भेटला. त्यांच्याशी संवाद साधला आणि आपली वाग्दत्त वधू मुक्रर केली. शर्मिला देशमुख. बी. कॉम झालेली शर्मिला आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. श्री. देशमुखांचा स्पेअरपार्ट्सचा कारखाना होता. दिसायला अतिशय मोहक वागण्यात शालीन अशी शर्मिला कोणाच्याही मनात भरण्यासारखीच होती.

‘‘काय पक्या, तुला वहिनी पसंत आहे का?’’

‘‘म्हणजे काय दादा? शर्मिला टागोरलासुद्धा मागे टाकील एवढी सुंदर आहे. सालस आणि गुणीसुद्धा आहे. अशी वहिनी कुणाला आवडणार नाही? तुमचा जोडा तर छान शोभून दिसतोय.’’

लगेचच साखरपुडा उरकला. लग्न तीन आठवड्यांनी करण्याचे ठरले. त्यानंतर एका महिन्याने ती दोघं अमेरिकेला जाणार होती. हा प्लॅन दादानेच ठरवला होता. तो शर्मिलाच्या सहवासाचा एकही क्षण वाया घालवत नव्हता. दोघेही आपल्या प्रणयाच्या विश्वात मशगुल होते. सर्वत्र आनंदी आनंद भरून राहिला होता. खरेदीची रणधुमाळी दोन्ही घरी चालू झाली.

त्याने मला जबरदस्तीने खरेदीला नेले आणि आश्चर्य म्हणजे स्वत:सारखा सूटसुद्धा माझ्यासाठी खरेदी केला. लग्नाच्या दिवशी सकाळी घालण्यासाठी शेरवानीच्या सेटसुद्धा दोघांसाठी सारखाच खरेदी केला.

‘‘दादा, लग्न तुझं आहे. माझ्यासाठी एवढा साज कशासाठी?’’

‘‘तुसुद्धा लवकरच बोहोल्यावर चढशीलच की, त्यावेळी घाई नको.’’

‘‘साहेबांचा खिसा चांगलाच गरम दिसतोय.’’

‘‘पूर्ण तयारीनिशी आलोय. शर्मिलाला अमेरिकन डायमंडचा सेट तिकडूनच आणलाय. उद्या आईबाबांनासुद्धा खरेदीसाठी घेऊन जाणार आहे. माझे जुने कपडे वापरावे लागतात म्हणून कुरकुर करायचास ना? चल, तुला खुश करून टाकतो.’’

लग्नाच्या दिवशीचा धुमधडाका तर अवर्णनीयच होता. शर्मिला सजून मांडवात आली आणि सर्व नजरा तिच्यावरच खिळल्या. उर्वशीच अवनीतलावर उतरल्याचा भास होत होता. तिच्या पप्पांनी म्हणजे आबासाहेब देशमुखांनी कार्य दृष्ट लागेल इतक्या उत्कृष्टपणे साजरे केले. रोषणाई, मानपान, खाणेपिणे, कुठेही कमी पडू दिले नाही. सगळीकडे आनंदाची लाटच लहरत होती. शर्मिलावर तर सगळेच खुश होते. आत्याने आईला सल्ला दिला, ‘‘वहिनी, प्रसाद आणि प्रकाश अगदी रामलक्ष्मणच, प्रसादसाठी शर्मिला आणलीस तशी प्रकाशसाठी उर्मिला आण बरं का.’’

मी तर मनोमन ठरवून टाकले की आपल्या पत्नीचं नाव उर्मिलाच ठेवायचे. शर्मिलाला मॅचिंग. लग्नातील विधी चालू असताना दादा शर्मिलाच्या कानात कुजबुजत होता व ती सलज्ज प्रतिसाद देत होती. चेहऱ्यावरचे मधाळ स्मितहास्य तिच्या मोहकतेत भर घालीत होते. दोघेजण अगदी ‘मेड (मॅड) फॉर इच अदर’ वाटत होते. वरात आली आणि तिच्या आगमनाने घर अनोख्या सुगंधाने भरून गेले. सर्व सोपस्कार व्यवस्थित पार पाडल्यावर नवदाम्पत्य बंगळुरूला मधुचंद्रासाठी रवाना झालं. एका आठवड्याने ते परत येणार होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी दोघेही अमेरिकेला जाणार होते. दादाने सगळा कार्यक्रम आधीच ठरवला होता. शर्मिलाच्या आगमनाने आईला मुलगी मिळाल्याचा अपार आनंद झाला होता.

‘‘पोरीने, किती पकटन जीव लावला. आठ दिवसांसाठी गेली तर इतकं सुनं सुनं वाटतंय. कायमची गेली तर काय अवस्था होईल हो?’’

‘‘फार लाघवी पोर आहे. पण आपण तिला नाही ठेवून घेऊ शकत.’’

पोहोचल्याबरोबर लगेच दादाचा फोन आला. नंतरचे दोन दिवससुद्धा दोघेही फोनवर भरभरून बोलले. नंतर तो काळाकुट्ट दिवस उगवला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी घरीच होतो. दुपारी तीनच्या सुमाराला माझा मोबाइल वाजला.

‘‘हॅलो.’’

‘‘मी…मी…शर्मिला. प्रकाश, एक भयंकर घटना घडलीय.’’

ती रडत रडत तुटक बोलत होती. घाबरल्यासारखी वाटत होती.

माझाही थरकाप उडाला.

‘‘शर्मिला, शांत हो. रडू नकोस. काय झालंय ते सांग. दादा कसा आहे? तू कुठून बोलतेस?’’

‘‘प्रसाद नाही आहे.’’

ती जोरजोरात हुंदके देऊ लागली. तणाव आणि भीती यांनी माझा समतोल ढळला. मी अक्षरश: ओरडूनच विचारलं.

‘‘नाही आहे? म्हणजे नक्की झालंय तरी काय? प्लीज लवकर सांग गं. माझं टेन्शन वाढतंय. तू आधी रडणं थांबव.’’

काहीतरी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे आईबाबांच्या लक्षात आले. ते कावरेबावरे झाले.

‘‘अरे, प्रसाद अमेरिकेला निघून गेला.’’

‘‘काहीतरीच काय बोलतेस? तुला सोडून कसा गेला? तू जाऊ कसा दिलास? हे बघ. शांत हो, सगळं सविस्तर सांग. आपण मार्ग काढू. आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर? काळजी करू नकोस पण आम्हाला कळू दे काय झालंय ते. मी येईन तिकडे. सावर स्वत:ला आणि सांग सगळं.’’

तिला जरासा धीर आला.

‘‘प्रसाद कोडईकॅनालला जाण्याची तिकिटं काढण्यासाठी सकाळी दहा वाजता बाहेर पडला. दोन दिवस तिकडे राहून मुंबईला परतण्याचा प्रस्ताव त्यानेच मांडला. उशीर झाला तर जेवून घ्यायलाही सांगून गेला. दोन वाजेपर्यंत वाट पाहिली. मोबाईल स्विच ऑफ येतोय. आता जेवावं असा विचार करत असताच रूम बॉय एक लिफाफा घेऊन आला. मला वाटलं आत बिल असेल. उघडून पाहिलं तर ‘मी अमेरिकेला परत जात आहे,’ असं लिहून प्रसादने सही केली होती. माझ्यावर आभाळ कोसळलं. डोळ्यांसमोर काजवे चमकले. मी बेशुद्ध पडणार होते. कसंबसं बळ एकवटलं. नंतर माझ्या लक्षात आलं की माझे दागिनेसुद्धा नाहीसे झाले आहेत. रात्री कपाटात ठेवले होते. माझ्याकडे पर्समध्ये थोडेसे पैसे आहेत. अगदी असहाय्य केलीय मला. काय करू मी आता? आबांनासुद्धा काही कळवलं नाही.’’

ती परत रडू लागली. मीसुद्धा परुता हादरून गेलो होतो. स्वत:ला सावरून तिला धीर देणे आवश्यक होते.

‘‘आबासाहेबांना कळवलं नाहीस ते योग्य केलंस. शर्मिला, तू धीर धर. रडू नकोस, तू एकटी नाही आहेस, आबासाहेबांना कसं कळवायचं ते मी बघतो. प्रसंग फारच कठीण आहे. आपण त्यातूनही मार्ग काढू.’’

‘‘तू हॉटेलमध्येच थांब. उपाशी राहू नकोस. मी सर्वांशी बोलतो आणि तिकडे येतो. बहुतेक रात्रीपर्यंत येऊ शकेन. नाहीतर उद्या सकाळी नक्कीच. काळजी घे हां. ठेवतो फोन.’’

आईबाबांना सगळा वृत्तांत सांगितल्यावर बाबा तर शरमेने काळे ठिक्कर पडले. आई अक्षरश: धाय मोकलून रडू लागली.

‘कुसंतानपेक्षा नि:संतान बरं’ असं म्हणायची वेळ आणली नालायकाने. असे म्हणतच ती बेशुद्ध झाली. तिला आम्ही दोघांनी कसेबसे सावरले. मी त्यांना दागिन्यांविषयी काहीच सांगितले नव्हते. मलाच लाजिरवाणे वाटत होते.

‘‘आईबाबा, आबासाहेबांना काहीच माहीत नाही. आपणच त्यांना कळवलं पाहिजे. मी समक्षच जाऊन सांगतो.’’

‘‘आम्ही येऊ का?’’

‘‘नको बाबा. आईची येण्याची परिस्थिती नाहीए आणि एकटं राहण्याचीसुद्धा. तेव्हा मी एकटाच जातो. अवघड वाटतंय. पण हा दुर्धर प्रसंग मलाच निभावून न्यावा लागणार असं दिसतंय.’’

मी दबकतच त्यांच्या घरात प्रवेश केला.

‘‘या प्रकाशराव, शमू आणि प्रसाद केव्हा येतायत?’’

‘‘नाही…नाही…मी…मी दुसऱ्याच कामासाठी आलो होतो.’’

‘‘बोला ना काही प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘हो…हो…कठीण प्रॉब्लेम. दादा अमेरिकेला निघून गेला.’’

‘‘काय? काल संध्याकाळीच शमूचा फोन आला होता. काही बोलली नाही आणि असं अचानक का ठरवलं.’’

‘‘नाही. तो एकटाच गेला.’’

‘‘आणि आमची शमू?’’

मी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी जमदाग्निचा अवतार धारण केला. ते रागाने थरथरत होते व मी भीतिने. त्यांनासुद्धा दागिन्यांविषयी काही सांगितले नाही.

‘‘हरामखोर साला. माझ्या एकुलत्या एका पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी केली. समोर असता तर गोळी घालून ठारच केला असता. पण मी त्याला सोडणार नाही.’’

त्यांना सावरण्यासाठी काकी पुढे आल्या.

‘‘तुम्ही जरा शांत व्हा. आधी पाणी प्या बघू. प्रसंग आला आहे खरा. त्याला तोंड तर दिलं पाहीजे ना? प्रथम आपण शमूला सावरलं पाहीजे. काय प्रसंग गुदरला आहे माझ्या बाळावर. कुठे आहे ती?’’

‘‘ती बंगळुरूलाच आहे हॉटेलमध्ये. मी तिला आणायला जातो आहे. तसं मी तिला फोनवर सांगितलं आहे.’’

‘‘नको, आम्ही दोघं जातो. तुम्ही आईबाबांजवळ थांबा. आपण शमूशी बोलू या का?’’

मी शर्मिलाच्या मोबाइलवर फोन लावला.

‘‘मी प्रकाश बोलतोय. आबासाहेबांच्या घरून. बरी आहेस ना तू? थांब बोल त्यांच्याशी.’’

‘‘शमू बेटा, रडू नकोस. धीर धर. त्याच्यावर धाय मोकलून रडायची वेळ आणतो की नाही बघ. आम्ही दोघं तुला आणायला तिकडे येतोय. शेवटच्या फ्लाईटने निघतो. काळजी घे.’’

आता क्रोधाची जागा करूणेने घेतली होती. त्यांचे डोळे पाझारू लागले. काकी व्याकूळ होऊन त्यांना वरवर धीर देत होत्या. आई तर अंथरूणालाच खिळळी होती. डोळ्यांतील पाण्याला खिळ नव्हता. इतक्या जणांना दु:खाच्या खाईत लोटणाऱ्या उलट्या काळजाच्या माझ्या भावाची मला मनस्वी किळस आली. शर्मिलाला घेऊन आल्याचे आबासाहेबांनी आम्हाला कळवले आणि ती तिघेही आमच्या घरी आली.

‘‘शर्मिला, काय झालं हे बाळा?’’ असे ओरडून आई पुन्हा बेशुद्ध झाली. बाबा केविलवाणे होऊन हात जोडू लागले.

‘‘आबासाहेब, आम्ही तुमचे अनंत अपराधी आहोत. असला अवलक्षणी कार्टा जन्माला घातल्याची शरम वाटते मला.’’

आबासाहेब एव्हाना शांत झाले होते. काकी आणि शर्मिला आईची समजूत घालत होत्या.

‘‘बाबासाहेब आपल्या सर्वांचंच हे दुर्भाग्य आहे. पण तुम्ही नका अपराधी वाटून घेऊ. मी त्याला पातळातून धुंडून काढीन आणि शिक्षा देईन. प्रकाश, त्याला अमेरिकेत कॉन्टॅक्ट करण्याचा काही मार्ग आहे का?’’

‘‘ऑफिसचा नाही, पण तो राहत असलेल्या अपार्टमेंटचा नंबर आहे माझ्याकडे.’’

‘‘जरा बघतोस प्रयत्न करून?’’

फोन लावला तर दादाने ते अपार्टमेंट तीन महिन्यांपूर्वीच सोडल्याचे कळले.

‘‘म्हणजे हरामखोराने पूर्वीपासूनच हा कट रचला होता. यात आमच्या मुलीचा मात्र बळी गेला. नवीन बिझनेस चालू करण्यासाठी माझ्याकडून पाच लाख रूपये घेऊन गेला.’’

‘‘माझ्याकडे याच कारणास्तव पैसे मागितले. पी.एफमधले दोन लाख रुपये होते, ते मी दिले त्याला.’’

मी गौफ्यस्फोट केला.

‘‘शर्मिलाचे बंगळुरूला नेलेले दागिनेसुद्धा नाहीसे झालेत.’’ आबासाहेबांना राग अनावर झाला.

‘‘नीच, अमानुष. तुमची दोन मुलं म्हणजे दोन विरूद्ध ध्रुव आहेत. आता मीसुद्धा हकिकत पेपरात प्रसिद्ध करणार. अमेरिकेत माझे काही हितसंबंधी आहेत. त्यांनाही कळवणार. त्यांची चांगली नाचक्की करतो सगळीकडे. आम्हाला फसवतो काय?’’

आता समाजात छी थू होणार या कल्पनेने की काय बाबा धास्तावल्यासारखे झाले.

‘‘आबासाहेब, आमच्या मुलाच्या हातून अक्षम्य गुन्हा झाला आहे. पण कृपा करून आपण सबुरीनं घ्या. या परिस्थितीतही मागचा पुढचा विचार करायला हवा. मेंदूला अगदी झिणक्षिण्या आल्यात. तुम्ही पाहताच. हिची परिस्थिती किती नाजूक झालीए ते. शिवाय शर्मिलाच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करायला हवा ना? एक आठवड्याचा अवधी द्या आम्हाला. काही तोडगा निघतो का बघतो. नाहीतरी अवहेलना आणि मानहानी सहन करावी लागतेच आहे. ती जगजाहीर होईल.’’

आबासाहेबांनी एक आठवडा थांबण्याचे कबूल करून खरोखरच कृपा केली होती.

‘‘कार्ट्याने तोंडाला काळं फासलं हो. पोरीच्या आयुष्याची होळी केली.’’

‘‘बरोबर आहे तुझं. आपण तिचे शतश: अपराधी आहोत. कधी न भरून येणारी जखम आहे ही. आबासाहेब भले माणूस आहेत म्हणून एक आठवडा तरी थांबायला तयार झाले. आपणच सावरून, समतोल विचार करून तिच्या कल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे. तेव्हा तू जरा धीराने घे आणि काय सुचतंय ते बघ.’’

आईला बाबांचे म्हणणे पटले. तिचा जीव शर्मिलासाठी तीळतीळ तुटत होता. तिने विचाराला चालना दिली असावी. कारण ती बाबांच्या बरोबर चर्चा करू लागली. तपशील कळला नाही. तरी दुसरा कोणता मुद्दा यावेळी विचारांत घेणे शक्यच नव्हते. हे मी जाणून होतो. आई पूर्ववत झाली आणि मला जरा हायसे वाटले, शर्मिलासुद्धा येऊन आईला भेटून गेली. आश्चर्य म्हणजे दोघींनीही मनावर कौतुकास्पद संयम ठेवला होता. एका संध्याकाळी मी ऑफिसमधून आलो तर आईबाबा नुकतेच देशमुखांकडे जाऊन आल्याचे कळले.

‘‘बाबा, आबासाहेबांनी बोलावलं होतं का?’’

‘‘नाही रे, सहज भेटून आलो. ही फार दिवस त्या दोघांना भेटली नव्हती आणि शर्मिलालासुद्धा पहाविशी वाटत होती.’’

‘‘ठिक आहे ना सर्व?’’

‘‘आहे ते ठिकच म्हणायचं. पण पुढचा विचार करणं आवश्यक आहे,’’ आईने त्यांना थांबवलं.

‘‘प्रकाश, आताच आलास ना? हातपाय धुवून घे. चहा टाकते. खाऊन घे.’’ आईचे अचानक थांबवणे मला खटकले. चहापाणी झाले. आम्ही तिथे बोलत बसलो. मला जाणवत होते की आईला काहीतरी सांगायचे आहे. पण तिला अवघड वाटते आहे. फार अस्वस्थ वाटत होती.

‘‘आई, काय झालं? काही सांगायचं आहे का? गोंधळलीस का?’’

‘‘अगं, सांग आता. का उगाच टेन्शन वाढवतेस?’’

‘‘प्रकाश, म्हणजे बघ…म्हणजे मला…आम्हाला वाटतंय म्हणून मी सुचवते. पण तू विचार कर हं!’’

‘‘कसला विचार करू आणि सुचवतेस काय? माझ्याशी बोलताना अशी चाचरेतस कशाला?’’

शेवटी धीर करून बाबांनीच गौप्यस्फोट केला.

‘‘प्रकाश, आम्हाला वाटतं, तू शर्मिलाचा पत्नी म्हणून स्विकार करावास,’’ सर्वांगातून विजेचा प्रवाह जात असल्याचा भास मला झाला आणि मी जवळजवळ किंचाळलोच.

‘‘कसं शक्य आहे, बहिनीप्रमाणे असणारी वहिनी आणि पत्नी? छे, मी कल्पनाच करू शकत नाही. तुम्ही असं सुचवता तरी कसं?’’

‘‘प्रकाश बाळा, हे सुचवताना अगदी जिवावर येतंय. माहिती आहे की तुझ्या स्वत:च्या वैवाहिक जीवनाबद्दल काही कल्पना असतील. उच्चशिक्षित आणि पगारदार असल्यामुळे तुला सर्वगुणसंपन्न वधू मिळेलही. परंतु आपण शर्मिलेचा विचार करू या. काहीही अपराध नसताना तिच्या आयुष्याची परवड होणार आणि आपल्याला ती उघड्या डोळ्यांनी पहावी लागणार, अर्थाअर्थी आपणच त्याला कारणीभूत आहोत ना? असलं अवलक्षणी कार्ट जन्माला येणं हे दुर्दैवच.’’

परत ती हुंदके देऊन रडू लागली.

‘‘आई, मला विचार करायला वेळ हवा. हेच बोलायला तम्ही देशमुखांकडे गेला होता वाटतं? काय म्हणाले ते?’’

‘‘आम्ही बोललो त्यांना. लगेच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांनाही विचार करायला वेळ लागेल ना? करतील ते फोन. तुझा विचार घ्यायला सांगितलाय त्यांनी.’’

माझ्या पायाखालची जमिनच सरकली. वज्राघात होत असल्याची जाणीव झाली. मेंदू अगदी सुन्न झाला होता.

‘‘आई, मी जरा मोकळ्या हववेर फिरून येतो.’’

‘‘अरे, यावेळी कशाला जातोस?’’

लांबवरच्या बागेत फिरून आल्यावर किंचित हलके वाटले. मी येईपर्यंत आईबाबा चिंतातुर होते. जेवणावर वासना नव्हतीच. चार शिते चिवडल्यासारखे केले व बिछान्यावर पडलो. विचाराला चालना देणे आवश्यक होते. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या वैवाहिक आयुष्याला सुरूवात होण्याआधीच चूड लागू पाहत होती. दादाचे जुने कपडे आणि पुस्तके वापरणारा मी आता त्याने त्यागलेली पत्नी…छे छे, शक्यच नाही ते. फेटाळूनच लावला पाहिजे हा प्रस्ताव. मेंदूला मुंग्या डसल्यासारखे वाटू लागले. परंतु मन:चक्षुसमोर सतत डोळे गाळून अंथरूणाला खिळलेली आई, नामुष्कीच्या शरमेने अगतिक झालेले बाबा, जमदाग्निचा अवतार धारण करणारे आबासाहेब, त्यांना सावरण्याचा प्रयत्न करणारी ती दु:खी माऊली काकी आणि आपल्या आयुष्याच्या वैराण वाळवंटातील वाळूप्रमाणे शुष्क झालेली शर्मिला दिसू लागली. दहा डोळे आशाळभूत नजरेने माझा मागोवा घेत असल्याचा भास झाला. आपण उष्ट्या ताटाचा धनी होणार या कल्पनेने अंत:करण पिळवटून निघाले.

दादाचे ड्रॉईंग छान होते. शाळेत असताना तो उत्तम चित्रे काढीत असे, अगदी हुबेहुब. चित्र पुरे झाले की ते मित्रांना दाखवायला तो घेऊन जाई, सगळे सामान तसेच ठेवून. घर नीटनेटके ठेवण्यावर बाबांचा कटाक्ष. आई मला विनवणी करी. ‘‘प्रकाश, राजा आवरून ठेव रे ते सामान. हे आले आणि पसारा बघितला तर उगाच चिडचिड करतील. बेसनाचे लाडू केलेत. देते तुला लगेच.’’

‘‘आई, त्याला सामान जागेवर ठेवून जायला काय होतं? बेसनाच्या लाडवाची लालूच दाखवून तू मला काम करायला लावतेस. त्याने बिघडवायचं आणि मी निस्तरायचं असा अलिखित नियम केलायस का तू?’’

आईचा तो अलिखित नियम माझा पाठपुरावा करीत होता. जीवनाच्या या टप्प्यावर त्याने केलेली अक्षम्य चूक मलाच निस्तरावी लागणार होती. निव्वळ तो माझा भाऊ होता म्हणून अभावितपणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले.

‘‘बालपण नको रे बाबा.’’

पळस

कथा * प्रियंवदा

वाईट चालींची, चरित्रहीन, रखेल अशी विशेषणं तिच्यासाठ वापरली जात होती. ते ऐकून अर्पिता अवाक् झाली. ही धरती दुभंगावी अन् आपण त्यात लुप्त व्हावं, अशा जागी लपावं जिथं कुणी तिला बघू शकणार नाही, नातलग तर कुजबुजतंच होते पण शलभच्या पत्नीनंही तिच्यासाठी असे अपशब्द वापरावेत? ती तर अर्पिताची खास मैत्रीण होती…तरीही तिनं असं म्हणावं?

अर्पिताचं नांव शलभच्या नांवाशी जोडलं गेलं होतं. त्यांचे संबंध अनैतिक आहेत हे बोललं जात होतं भरल्या कंठानं तिनं शलभला विचारलं, ‘‘आपलं नातं अनैतिक आहे असं म्हणतात, खरंय का ते? कारण तुमचं लग्न झालंय. विवाहित आहात तुम्ही. त्यामुळे मला तुमच्याबरोबर राहण्याचा हक्क नाहीए. पण इथून मला इतरांनी तुमची रखेल म्हणावं?’’

शलभला काट्यासारखा टोचला होता हा प्रश्न, अर्पिताचे अश्रू अखंड वाहत होते. रडता रडताच म्हणाली, ‘‘इतकी बेअब्रू झाल्यावर आता माझ्याशी कोण लग्न करेल?’’

तिला दिलासा देत शलभनं म्हटलं, ‘‘मी शोधेन तुझ्यासाठी मुलगा. तुझ्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी.’’

‘‘माझ्याशिवाय तुम्ही राहू शकाल?’’

अर्पिताच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी शलभनं तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून तिला थोपटायला सुरूवात केली. थोड्याच वेळात अर्पिताला गाढ झोप लागली. तिच्या निरागस चेहऱ्याकडे शलभ बघत होता. अजूनह गालावरचे अश्रू सुकले नव्हते. अर्पिताच्या अनेक आठवणी त्याच्या मनांत जाग्या झाल्या. समुद्राच्या लाटांसारख्या असताता आठवणी. उंचबळून येतात अन् परत जाताना, भरून न येणारं एकाकीपण, विचित्र रिकामपण मागे ठेवून जातात.

अर्पिता नात्यानं शलभची कझिन होती, वयानंही त्याच्याहून बरीच लहान होती. ते अंतर त्यांच्या आवडी-निवडी, बोलणं, वागणं यातूनही जाणवायचं. शलभला लहानपणी बघितलेली अर्पिता आठवत होती. अर्पिताला शलभ अजिबातच आठवंत नव्हता.

अर्पिताच्या आयुष्यात चढउतार खूप होते. आई वारल्यावर वडिलांनी दुसरं लग्न केलं. अर्पिता आजोळी राहू लागली. आयुष्य खडतर होतं. त्यातूनच ती शहाणी होत गेली. पण स्वभावात त्या कडवट आठवणींचा ठसा उमटलाच.

किती तरी वर्षांनी अर्पिता शलभला भेटली. तो तिला अजिबात परका वाटला नाही, उलट इतर कुणाबद्धल वाटला नव्हता तो आपलेपणा, जिव्हाला त्याच्याबद्धला वाटला.

काही दिवसातच तिला तो इतका जवळचा वाटू लागला की तिनं लहानपणापासून ज्या मुलांवर प्रेम करत होती, ते प्रेमप्रकरणही शलभला सांगितलं. दोघांना लग्न करायचंय पण घरातले तयार नाहीत हेदेखील तिनं शलभला सांगितलं.

‘‘तो मुलगा मुस्लिम आहे. त्याचं नाव आसिफ आहे. तो दिल्लीला नोकरी करतो. मीही नोकरी करेन, पेइंगगेस्ट म्हणून दिल्लीत राहणं सोपं आहे. कोर्टात रजिस्टर लग्न करूनच मग घरी सांगू.’’ एका दमात तिनं शलभला सांगितलं. ‘‘तुम्ही मला दिल्लीला घेऊन चला,’’ तिनं शलभला म्हटलं.

शलभनं तिला खूप समजावलं पण अल्लड वय अन् प्रेमात वेडं झालेलं मन…तिची समजूत पटेना.

त्यावेळी शलभला दिल्लीलाच पोस्टिंग मिळालं होतं. चांगली कंपनी, चांगली नोकरी, सुखी कौटुंबिक आयुष्य…अर्पिताच्या घरात शलभच्या नोकरीचा, वडिलकीचा दबदबा होता. तिच्या आईवडिलांना त्यानं समजावून सांगितलं. तिच्या भविष्याचा विचार करून त्यांनी परवानगीही दिली.

अर्पिता आनंदानं खुलून आली. आसिफला भेटायला ती शलभबरोबर दिल्लीला आली. अर्पिताची सगळी जबाबदारी तिच्या वडिलांनी शलभवर टाकली होती. त्यानंही ती आनंदानं स्वीकारली होती.

दिल्लीला पोहोचल्यावर शलभनं तिला पी.जी. म्हणून जागा मिळवून दिली. जवळच्याच एका स्टोअरमध्ये नोकरीही मिळाली. लवकरच अर्पिता दिल्लीच्या अतिशय धावपळीच्या आयुष्यात रूळली. तिला ते आयुष्य आवडायला लागलं. रविवारी आसिफ यायचा. मग दोघं बाहेर फिरायची, कधी सिनेमा, कधी जेवण, कधी भटकंती नंतर आइस्क्रीम.भराभर दिवस जात होते.

मार्च महिना आला. पळसाच्या झाडांवर लाललाल फुलांनी रंगोत्सव मांडला. लहानपणापासून अर्पिताला ही फुलं फार आवडायची. लाल रंग तिचा आवडता होता. गावी तिच्या घरासमोर पळसाची झाडं होती. दिल्लीत कुठंही पळस फुललेला दिसला की तिला घरीच असल्यासारखं वाटायचं.

होळीचा सण काही दिवसांवर आला. होळी झाली की ती आसिफबरोबर रजिस्टर लग्न करणार होती. तसा फॉर्मही त्यांनी भरला होता. पण घडलं वेगळंच. होळीच्या दोन दिवस आधी अर्पिता आजारी असल्याचा निरोप शलभला मिळाला. शलभ तिच्या निवासस्थानी गेला तेव्हा अर्पिता तापानं फणफणली होती.

अर्पिताच्या दोघी रुममेट्सनी शलभला सांगितलं की आसिफनं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये फॉर्म भरल्यानंतर अर्पितावर धर्म बदलण्यासाठी खूपच दबाव आणला. धर्म बदलणार नाही म्हटल्यावर त्यानं हे लग्न होऊच शकत नाही असं सांगून अर्पिताशी संबंध तोडले अन् तो दिल्ली सोडून कुठंतरी निघून गेलाय. जे स्वप्न डोळ्यात घेऊन अर्पिता दिल्लीला आली होती, ते स्वप्न उधळलं गेलं होतं. कल्पनेच्या भराऱ्या घेताना पंखच मोंडले होते. रक्तबंबाळ झाले होते.

पी.जी.च्या मालकांची परवानगी घेऊन शलभ रात्रभर तिथेच थांबला. त्यानं तिच्या वडिलांशी संपर्क केला. तिला परत घरी पोहोचवू का म्हणून विचारलं पण त्यांनी, ‘‘आता काय ते तुम्हीच बघा,’’ म्हणून हात झटकले. सकाळी शलभनं अर्पिताला आपल्या फ्लॅटवर आणलं. इथं तो एकटाच राहत होता. त्यानं अर्पिताच्या सेवेसाठी एक नर्स ठेवली. त्याच्या ऑफिसच्या वेळ व्यतिरिक्त तो अर्पिताची काळजी घ्यायचा. अर्पिताला मानसिक धक्का फारच जबर बसला होता. इतक्या वर्षांचं प्रेम केवळ धर्मावरून संपू शकतं? आसिफ असा विश्वासघात करू शकतो हेच तिच्या गळी उतरत नव्हतं. जात किंवा धर्म प्रेमाच्या आड का यावा, हे तिच्या बुद्धीला उमजंत नव्हतं.

शलभनं तिची परोपरीनं समजूत घातली. मानसिक धक्क्यातून सावरायला त्यानं खूपच मदत केली. शारीरिक अन् मानसिक आजारातून पूर्ण बरी झाल्यावर शलभनं त्याच्याच ऑफिसात नोकरीही लावून दिली. अर्पितानं आता शलभच्या घराची जबाबदारी स्वत:वर घेतली. सकाळी उठून चहा, ब्रेकफास्ट तयार करणं, दोघांचे डबे तयार करणं, ऑफितून आल्यावर रात्रीचा स्वयंपाक अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये तिनं स्वत:ला गुंतवून घेतलं.

बरेचदा शलभला ऑफिसात उशीरापर्यंत थांबावं लागे. घरी यायला उशीर होई. अर्पिता तो घरी येईपर्यंत जागी राहून त्याचं जेवण गरम करून वाढायची. रात्री कधी कधी भयानक स्वप्नं पडून तिला जाग यायची. घाबरून ती आपल्या खोलीतून शलभच्या अंथरूणात येऊन झोपायची. शलभ तिला थोपटून शांत करायचा.

अर्पिताच्या आयुष्यातला तो अवघड काळ शलभच्या आधारावरच पार पडला. अशा काळातच काही नवी नाती तयार होतात तर काही जुन्या नात्यांना तडे जातात. तीन चार महिनेच झाले होते. पण त्यांना वाटायला लागलं जणू जन्मोजन्मीची ओळख आहे. एकमेकांचे चेहरे बघूनच त्यांना एकमेकांच्या मन:स्थितीची कल्पना यायची. शलभनं हल्ली आपल्या गावी जाणं खूपच कमी झालं होतं. कधी गेलाच तर परतीचं रिझर्वेशन अर्पिता आगाऊ करवून घेत होती.

अर्पिता आणि शलभची जवळीक वाढत होती अन् बायकोबरोबरचं शलभचं नातं खूपच बिघडलं होतं. शलभची वागणूक, त्याचं अर्पिताबरोबर असणं, बायकोला सहन होत नव्हतं. ती प्रचंड चिडचिड करायची. तिला घटस्फोट देऊन अर्पिताशी लग्न करावं असंही शलभच्या मनांत आलं होतं. पण मुलाचा लोभस, निरागस चेहरा डोळ्यापुढे यायचा. त्याचं वडिलांवर जिवापाड प्रेम होतं.

दोन्ही घरात, नातलगांमध्ये कुजबुज सुरू झाली. कुजबुज हळूहळू वाढली अन् शलभवर आरोप व्हायला लागले. शलभचं शांत सुखी आयुष्य ढवळून निघालं. नात्यांच्या अग्नीपथावरून चालताना पाय भाजून फोड येणं स्वाभाविकच होतं. पण ते फोड इतक्या यातना देतात हे दोघांना आता जाणवायला लागलं.

शलभ विचारातून भानावर आला. अर्पिताचं डोकं मांडीवरून खाली उशीवर ठेवलं. पाय मोकळे करायला बाल्कनीत येऊन उभा राहिला. आकाशात प्रभात समयीची लाली दिसत होती. जणू पळसाची फुलं कुसकरून उधळली असावीत. समोरचं पळसाचं झाड निष्पर्ण होतं. पण फुलांनी डवरलं होतं. जणू जुनी नाती तोडून नवी नाती निर्माण झाली होती.

आता शलभवर अर्पिताच्या लग्नाची आणखी एक जबाबदारी येऊन पडली होती. त्यानं मनापासून प्रयत्न केले अन् ओळखीतलाच एक मुलगा तिच्यासाठी निवडला. ऑफिसातल्या सहकाऱ्याचा घाकटा भाऊच होता. मुलाला अन् घरच्यांना अर्पिता पसंत पडली अन् लग्न ठरलं.

शलभची बायको चिडलेली होती. शलभला एकट्यालाच सर्व खर्च व तयारी करायची होती. तो आपल्या परीनं सगळं करत होता. सावत्र आई व वडीलही अर्पिताच्या लग्नाला येणार नव्हते. खर्चही करणार नव्हते. वनमॅन आर्मी बनून शलभ सगळ्या आघाड्या लढवंत होता.

आता नवं नातं जपायचं म्हणून अर्पिताही शलभपासून दूर राहत होती. अर्पितासाठी, अर्पितामुळे शलभनं घरच्या मंडळींशी, बायकोशी संबंध तोडले होते अन् तीच अर्पिता आता त्याला दुरावली होती. आता ती रात्री त्याच्यासाठी जागत नव्हती. सकाळीही मुकाट्यानं चहाच कप त्याच्यासमोर ठेवत होती.

पुन्हा नवा ऋतू येऊ घातला होता. वातावरणांत बदल जाणवंत होता. शलभला खूपच एकाकी वाटत होतं. अर्पिताचा नवा संसार, नवं आयुष्य सुरू होतंय म्हणून समाधान अन् आनंद होता. पण इतर नाती तुटल्याचं दु:खही होतं. शेवटी लग्नाचा दिवसही. विवाहाचे सर्व विधी पूर्ण झाले. अर्पिताच्या डोळ्यात अश्रू होते. तिला रडूं अनावर झालं. शलभचं घर तिनं मनापासून सजवलं होतं. भिंतींचा रंग, दाराखिडक्यांचे पडदे, सर्व तिच्या पसंतीचं होतं. बाल्कनीतल्या छोट्याशा बागेत तिनंच लावलेली फुलझाडं डोलंत होती. अश्रूभरल्या डोळ्यांनी अर्पितानं सगळं मनांत साठवून घेतलं. आता या घरातून तिची पाठवणी झाल्यावर पुन्हा ती इथं येणार नव्हती.

घराच्या फाटकाशी तिचा आवडता पळस उभा होता. शलभही मनांतून हेलावला होता. अर्पिता जाताना त्याच्या आयुष्यातला आनंद आणि रंगही घेऊन जातेय. हे त्याला समजंत होतं. पण त्यानं आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली होती. सन्मानाचं आयुष्य अन् चांगला जोडीदार त्यानं तिला मिळवून दिला होता. त्याच्या मनांवरचं ओझं उतरलं होतं.

कन्या न तू, वैरीणी

कथा * सुधा कस्तुरे

‘आजी, अगं, तुला ठाऊक आहे का? आईनं लग्न केलंय.’’ माझ्या पंधरा वर्षांच्या नातीनं मला सांगितलं. सकाळच्या प्रहरी तिच्याकडून ही बातमी ऐकून बॉम्ब पडल्यासारखी मी हादरले.

‘‘तुला कसं समजलं? फोन आला होता का?’’

‘‘नाही, फेसबुकवर पोस्ट केलंय,’’ रीनानं म्हटलं.

मी घाईनं तिच्याकडून मोबाइल घेतला. त्या पुरूषाचं प्रोफाइल बघून मी हतबद्ध झाले. तो पाकिस्तानातला होता. मी दोन्ही हातांनी माझं डोकं दाबून धरलं, ‘‘ही मुलगी काय करेल ते थोडंच आहे. का अशी छळतेय ती आम्हाला?’’ मी स्वत:शीच पुटपुटले.

रीनानं लगेचच आपल्या आईला ‘अनफ्रेंड’ केलं. दहावीला आहे. अगदी लहान नाहीए. बरंच काही कळंत तिला.

घरात एकदम शांतता होती. माझे पती घरी नव्हते. थोड्या वेळानं ते घरी आल्यावर त्यांना ही बातमी समजली. तेही हादरलेच! मग थोड्या वेळानं म्हणाले, ‘‘बरं झालं. निदान लग्न करून स्वत:चा संसार मांडावा अन् आम्हाला जबाबदारीतून मुक्त करावं. निदान स्वत:च्या मुलांना सांभाळावं. आता या वयात आम्हाला नातवंडं सांभाळून होत नाहीत…तू शांत हो…काळजी करू नकोस.’’

‘‘काळजी आहेच हो! मुक्ती कुठली मिळतेय? उलट जबाबदारी वाढलीच आहे. ज्याच्याशी लग्न केलंय तो कुणी पाकिस्तानी आहे. आता ती तिथंच राहील. म्हणून तर काही बोलली नव्हती. आता मुलं आपल्यालाच सांभाळावी लागतील. अर्थात् तिनं हे सांगितलं असतं तर आपण परवानगी दिलीच नसती. आपल्या देशात मुलं नाहीएत का? मला म्हणाली होती की ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जाते आहे.’’ मी म्हटलं.

ते चकित होऊन माझ्याकडे बघत राहिले.

‘‘कुणी मुलगी इतकी स्वाथी कशी होऊ शकते जिला म्हाताऱ्या आईबाबांची काळजी नाही…कुणी आई इतकी कठोर कशी होऊ शकते, जिला आपल्या मुलांची माया नाही,’’ मी संतापून बोलत होते.

‘‘खरंच! आपली नाही, निदान तिनं मुलांची तरी काळजी घ्यायला हवी…तिच्या मुलांना खरं तर आपणच वाढवतो आहेत. तिच्याबरोबर एकत्र राहताना घरात कायम ताणतणाव असायचा. आता ती नाहीए म्हणताना आपण निदान निवांत राहू शकू.’’ यांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

‘‘ते ठीक आहे, पण आपण तरी कुठवर सांभाळणार? आणि खर्चाचं काय? मुलांच्या खर्चाला पैसे नकोत का?’’ मी हताशपणे म्हणाले.

‘‘खरंय!’’ त्यांनी म्हटलं.

‘‘बघूया, काय करता येईल…मार्ग तर काढावाच लागेल.’’

आम्हाला मुलगा नाही. एकुलती एक मुलगी मंजिरी. लाडाकोडात वाढवलं तिला. सॉफ्टवेयर इंजिनियर झाली. नोकरीला लागली. पण तिचं सगळंच वागणं खटकणारं होतं. जिवापाड प्रयत्न केले पण तिचे गुण वेगळेच होते. तिचं वागणं आम्हाला पटत नव्हतं. तिला दुसरा मुलगा झाला तेव्हापासून आम्ही तिची पहिली मुलगी अन् या मुलाला सांभाळायला तिच्या बरोबरच राहत होतो.

कित्येकदा तिच्या वागण्यांत, वाईट बोलण्यानं आम्ही दुरावलो जात होतो. मग आता इथं रहायचं नाही असं ठरवून पुन्हा आपल्या घरी येत होतो. पण मग मुलांचे होणारे हाल बघून आम्हाला परत तिथं जावंच लागायचं. आमचा जीव मुलांमध्ये गुंतलेला होता. त्याचा फायदा मंजिरी घ्यायची.

आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न केला की ती आम्हाला ऐकवायची, ‘‘तुम्ही मला वाढवलंत तसं मला माझ्या मुलांना वाढवायचं नाहीए.’’ तिला वाढवताना आमचं काय चुकलं होतं ते आम्हाला अजूनही कळलेलं नाही. निर्लज्जपणा, बेजबाबदारपणा, अती महत्त्वाकांक्षा, त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती हे सगळं तिच्यात कुठून आलं ते ही आम्हाला समजलेलं नाहीए.

खरं तर कष्ट केल्याशिवाय तिला सगळं हवं असतं. ऑफिसातही कामं टाळण्यासाठी चक्कर येणं, जीव घाबरणं अशी नाटकं करून सुट्या घ्यायची. डॉक्टरकडून खोटे रिपोर्ट तयार करून घेऊन आम्हाला घाबरवायची अन् उपचारांचा खर्च आमच्याकडून वसूल करायची.

आम्हाला ती इमोशनली ब्लॅकमेल करायची. सुरूवातीला तिचे रिपोट्स बघून आम्ही घाबरून जात असूं. वाटायचं, हिला काही झालं तर या मुलांचं काय व्हायचं? पण ती अगदी बिनधास्त असायची. नंतर कळलं की ती गुगलवरून अशा आजारांची माहिती मिळवायची नोकरी सोडायची, काही तरी बिझनेस सुरू करायचा, पुन्हा त्यात तोटा झाला की तो बंद करून नोकरी सुरू करायची….तिला तीच सवय लागली होती जणू. घरकामात तर अजिबातच तिचं लक्ष नव्हतं. बाई किंवा हॉटलच्या स्वयंपाकावरच मुलं वाढंत होती.

तिला अमेरिकेचं आकर्षण होतं. तिथलाच नवरा हवा होता. नेटवरून तिनंच अमेरिकेतल्या एका मुलाशी लग्न ठरवलं. तो भारतात आला. आम्ही लग्न करून दिलं. पण त्या मुलाची संपूर्ण माहिती काही तिनं आम्हाला दिली नाही. आम्हाला शोधही घेऊ दिला नाही. लग्न करून ती अमेरिकत निघून गेली अन् दीडच वर्षात पोटात बाळ घेऊन भारतात परत आली ती पुन्हा त्याच्याकडे न जाण्यासाठीच!

अमेरिकेत गेल्यावर तिला कळलं की तो विवाहित आहे. आधीच्या दोन बायकांपासून त्याला मुलंही आहेत. तिनं तिथून पळ काढला. पुन्हा भारतात आली. आम्हाला धक्काच बसला होता. तिचं बाळंतपण निस्तरलं. तान्ह्या मुलीला आमच्याजवळ ठेवून घेतलं. मंजिरीला दिल्लीला नोकरी मिळाली म्हणून ती एकटीच दिल्लीला गेली.

एकदा अवचित आम्ही लहानग्या रीनाला घेऊन दिल्लीला मंजिरीकडे गेलो तर अजून एक धक्का बसला. ती कुणा तरूणाबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती. काय करावं या मुलीला आम्हाला समजत नव्हतं. आम्हाला बघताच तो मुलगा जो पळाला तो आजता-गायत परत आला नाही. मंजिरी तेव्हा चार महिन्यांची गरोदर होती. गर्भपात करण्याची वेळ निघून गेली होती. अगदी नाईलाज म्हणून आम्हाला तिच्याबरोबर दिल्लीला रहावंच लागलं.

मधल्या काळात मंजिरीची एक दोन प्रेमप्रकरणं आणखी झाली. पण आमच्या भाग्यानं तिला त्यातून दिवस गेले नव्हते. ती प्रकरणंही निकाली निघाली…पण आतचा हे लग्न, त्यातून पाकिस्तानी माणसाशी…मंजिरीला अक्कल का येत नाही? किती वेळा चुका कराव्यात माणसानं. आता हा माणूस तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत निभवणार आहे का? त्यातून अजून एखादं मुल झालं तर?

केवळ कल्पनेनंच मला कापरं भरलं. तिचा भूतकाळ बघता माहितीतला कुणी पुरूष तिला स्वीकारेल हे शक्यच नाही. नातलग, समाज आमची कींव करतो. आम्ही चांगले आहोत. मंजिरीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय, हेसुद्धा सगळे जाणून आहेत. पण म्हणून उघड्या डोळ्यांनी कुणी मंजिरीला आपलं म्हणेल हे शक्यच नाही आणि आता जे काही तिनं केलंय त्यानंतर तर तिला भारतात येऊन आपल्या मुलांनाही भेटायला तोंड कुठं आहे? नक्कीच तो कुणी तरी खूप श्रीमंत असामी असणार. पैशासाठी मंजिरीनं त्याला आपल्या जाळ्यात ओढलं असेल. पैशासाठी ती काहीही करू शकते. बघूया, लवकरच काय ते समोर येईल…किती दिवस अशा गोष्टी लपून राहतात?

रीनानं तिला फेसबुकवर अनफ्रेंड केल्यावर मंजिरीला हे तर लक्षात आलं की तिच्या लग्नाची बातमी सर्वांना समजली आहे. महत्त्वांचं म्हणजे तिची लेक तिच्यावर फारच नाराज आहे. मग रोजच मंजिरीचे फोन येऊ लागले, आम्ही ते घेत नव्हतो. पण एकदा मीच विचार केला की निदान तिच्याशी बोलून घ्यायला हवं. मुलांच्या भवितव्याचाही विचार करायलाच हवा ना?

शेवटी एकदा मी फोन उचलला अन् ‘हॅलो’ म्हटलं, ती लगेच बोलायला लागली, ‘‘रीनाला समजव जरा. मला ही माझं आयुष्य आनंदातच जगायचा हक्क आहे म्हणावं. माझ्या लग्नामुळे कुणाला काय त्रास होतोय? आणि मी माझ्या मुलांची जबाबदारी घेते आहे. मी सांभाळीन त्यांना. काहीही कमी पडू देणार नाही. कारण ज्याच्याशी मी लग्न केलंय तो मोठा व्यापारी, व्यवसायी आहे. गडगंज पैसा आहे त्याच्याकडे…’’

एकूण माझा अंदाज बरोबरच होता. पैसा बघून त्याच्याशी माझ्या पोरीनं लग्न केलं होतं. काही दिवस गेले अन् कुरियरनं एक भलं मोठं पार्सल आलं. त्यात महागडे मोबाईल, मुलांसाठी उंची ब्रॅन्डेड कपडे अन् काही खेळणी होती. शिवाय ऑनलाइन खाण्याचे किती तरी पदार्थ केक, पेस्ट्री, चॉकलेट, सुका मेवा वगैरे पाठवलं होतं…आमच्या मुलीनं तिच्या मुलांसाठी. पण धाकट्या चिंटूखेरीज कुणालाच ते बघून आनंद झाला नाही.

पुन्हा एकदा तिचा फोन आला. मुलांचा व्हिसा काढून घ्या. ती मुलांसाठी पाकिस्तानची एयर तिकिटं पाठवते आहे. अन् आमच्यासाठी आमच्या घरी जाण्यासाठी ही विमानाची तिकिटं पाठवते आहे.

रीना संतापून म्हणाली, ‘‘मला नाही जायचंय तिकडे. आय हेट हर…नाती, मी तुझ्याजवळच राहणार आहे.’’

चिंटू म्हणाला, ‘‘मला जायचंय आईकडे…पण ती इथं का येत नाही?’’

मला काहीच बोलणं सुधरेना. शेवटी पुन्हा तिचा फोन आला तेव्हा मी म्हटलं, ‘‘तुझा निरोप मिळालाय. तू मुलांना जन्म दिला आहेस, तेव्हा त्यांच्यावर तुझ्च हक्क आहे. कायदा ही तुझ्याच बाजूनं असणार…आम्ही फक्त केयर-टेकर आहोत. आमचं नातं थोडीच आहे मुलांशी…फक्त त्यांची काळजी घेऊन  वाढवलंय त्यांना. खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्यात जीव गुंतलाय. एकदा ती तिकडं गेली की आम्ही त्यांना बघूही शकणार नाही, की व्याकूळ होऊ आम्ही, याची कल्पना आहे का तुला?’’

‘‘अन् खरंच तुला मुलांची इतकी काळजी असती तर हे पाऊल उचलण्यापूर्वी तू विचार केला असता, अगं,, मुलांना मुळात प्रेम अन् वेळ हवा असतो. ढीगभर पैसा नको असतो. मला कळंतच नाही की तू आमची मुलगी असून अशी कशी निपजलीस? आमच्या भावना तुला समजायच्याच नाहीत…तू मुलांची काळजी घेशील यावर माझा विश्वास नाही…अन् त्या सावत्र बापावर तरी विश्वास कसा ठेवावा आम्ही?

‘‘चिंटूची इच्छा आहे, त्याला पाठवून देते, पण, रीनाला नाही पाठवणार. काळ तसाच वाईट आहे…वयात आलेली पोर…तिला मायेची, संरक्षणाची गरज आहे. मला जमेल तसं मी करेन…पण रीना राहील माझ्याजवळंच.’’

एवढं बोलून मी फोन बंद केला. माझ्या पतींनी अन् रीनानं मला शाबासकी दिली. त्यांना निर्णय पटला होता…रीनानं तर आनंदानं मला मिठीच मारली.

माझा बंधूसखा, पती माझा

कथा * नीरजा श्रीखंडे

‘‘प्रेरणा वहिनी, कुठं आहेस तू?’’ अंबुजनं डोक्यावरचं हेल्मेट काढून बाजूला ठेवलं अन् हातातला पुडा डायनिंग टेबलवर ठेवला. भिजून आला होता तो, शर्ट जरा झटकला अन् म्हणाला, ‘‘आत्तासाठी मी जेवण बाहेरून आणलंय, तू आता काहीही करत बसू नकोस.’’ तो आपल्या खोलीतून फ्रेश होऊन बाहेर आला तोवर प्रेरणाही तिच्या खोलीतून हॉलमध्ये आली होती.

ती एवढ्यातच कानपूरहून एक इंटरव्ह्यू देऊन परतली होती. रात्रीचे आठ वाजले होते. प्रेरणाचा नवरा पंकज त्याच्या नोकरीच्या टूरवर गेलेला होता. म्हणूनच प्रेरणानं अंबुजच्या मदतीनं हा इंटरव्ह्यूचा घाट घातला होता आणि तो पारही पाडला होता. पंकज असता तर त्यानं तिला जाऊच दिलं नसतं. तो चिडला असता, रागावला असता. अंबुजनंच पेपरला जाहिरात बघितली होती. त्यानं तिला त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून दिला होता. तिला कानूपरचं तिकिट काढून देऊन गाडीतही बसवून आला होता. इथून तो सतत फोनवर तिची चौकशी करत होता. प्रेरणा कानपूरहून नोकरी पक्की करूनच आली होती. ही बातमी ऐकून अंबुजही आनंदला होता. पंकजला मात्र तिनं ही बातमी अजून दिली नव्हती, कारण त्याचा फोन लागत नव्हता.

‘‘अरे, तू भिजून आला आहेस? मी घरी पटकन् काही तरी केलं असतं रे…मला ठाऊक आहे गेले तीन चार दिवस तू फक्त ब्रेड, सूप, दूध एवढ्यावरच आहेस. बाहेरचं जेवण तुला आवडतही नाही,’’ प्रेरणानं म्हटलं.

अंबुज फक्त हसला. प्रेरणानं म्हटलं, ‘‘मी आधी चहा करते. आल्याचा चहा तुलाही चालेल ना,’’ तिच्या हातचा चहा त्याला आवडतो हे ती जाणून होती.

‘‘हो वहिनी, तू गेल्यापासून चहा प्यायलोच नाहीए. मला काही तुझ्यासारखा चहा जमत नाही आणि माझ्या हातचा चहा मला आवडतच नाही,’’ भाबडेपणानं अंबुज म्हणाला.

‘‘माझ्या धाकट्या जावेनं आता लवकरात लवकर घरात यायला हवंय. ती आली की तुझ्या आवडीच्या चहापासून सगळं तिला शिकवेन मी. मग तुझे हाल नाही होणार,’’ प्रेरणानं चहाचा कप त्याच्या हातात देत म्हटलं.

अंबुज थोडा लाजला. मग पटकन् विषय बदलत म्हणाला, ‘‘ते सोड, तुला नोकरीवर कधीपासून जावं लागेल?’’

‘‘विषय बदलू नकोस. मला एक सांग, जाण्याआधी मी तुला काही मुलींचे फोटो अन् त्यांची माहिती देऊन गेले होते, त्यातली कुणी आवडली का?’’

‘‘नाही, मला असं फोटो पाहून लग्न करायचं नाहीए. हा विषय संपला,’’ अंबुजनं म्हटलं अन् लगेच त्यानं विचारलं, ‘‘कधी जॉईन व्हायचंय तुला?’’

‘‘त्यांनी एक महिन्याचा अवधी दिलाय. पण आधी तुझ्या दादांना कसं राजी करायचं हे बघायला हवं. नोकरीपर्यंत तर तू पोहोचवलंस. इंटरव्ह्यू उत्तम झाला. नोकरीही मिळाली. पण जर दादांनी नकार दिला तर सगळंच पाण्यात जाणार. माझं ते ऐकणार नाहीत याची मला खात्री आहे. तूच बघ त्यांना कसं राजी करायचं ते.’’ प्रेरणानं म्हटलं.

‘‘मी दादाला राजी करेन वहिनी, त्याची काळजी करू नकोस…नोकरी करणं यात वाईट काय आहे?’’

‘‘तेच तर मी म्हणतेय, पण त्यांच्या डोक्यात काही तरी कल्पना आहेत…त्यांना दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत किंवा त्यांनी स्वत:चा बिझनेस सुरू करून त्यात स्थिरथावर होईपर्यंत तरी मी त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करू शकते. सध्या मला ते तीस हजार रुपये पगार देताहेत. आपलं त्यात चांगलं भागू शकेल. आपण कानपूरलाच शिफ्ट होऊयात. तुला काय वाटतं?’’

‘‘कल्पना चांगली आहे पण…’’

‘‘आता पण बीण काही नको भाऊजी. दादांना समजवा, तिथं माझ्या बाबांचा एक प्लॉट आहे, त्यांनी तो माझ्या नावे केला आहे. तो आपल्या कामी येईल. तिथं काही बिझनेस सुरू करता येईल. तुम्ही दोघं भाऊ ऑटोमोबाइल इंजिनियर आहात. दोघं मिळून छान काम सुरू करा. नाहीतरी दादांना ही नोकरी फारशी पसंत नाहीच आहे. तूच त्यांना हे पटवू दे. तुझं ते नक्की ऐकतील.’’

‘‘बरोबर म्हणतेस तू, अगं, पण हे तुला आधी का सुचलं नाही?’’

‘‘मागे एकदा मी पंकजशी बोललेही होते, पण त्यांनी ते मनावर घेतलं नाही…’’

‘‘ठीकाय, मी बोलतो दादाशी.’’

‘‘ते आल्या आल्या नको बोलूस हं! त्यांना जरा येऊन सेटल होऊ दे मग…’’ प्रेरणानं म्हटलं.

‘‘हो, हो…तसंच करेन…पण वहिनी, नोकरीची ट्रीट तर आधीच द्यावी लागेल…’’

‘‘ऊ!’’ प्रेरणानं हसून मान्य केलं.

लग्न होऊन प्रेरणा या घरात आली, तेव्हा अंबुज तिचा दिर तर होताच पण धाकटा भाऊ किंवा मित्र हेच नातं त्या दोघांमध्ये अधिक होतं. प्रेरणा त्याच्याहून दोन वर्षं मोठी होती अन् पंकज प्रेरणाहून सात वर्षांनी मोठा होता. दोघांमध्ये वयाचं अंतर होतंच, पण वडिलांच्या मृत्यूनंतर अचानर अंगावर आलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्याला अकाली प्रौढत्त्व आलं होतं. हसणं, खिदळणं, सिनेमा, नाटक. टीव्ही, हॉटेलिंग असे प्रकार त्याला अजिबात जमत नव्हते, आवडतही नव्हते. मरण्यापूर्वी आईनं, त्यांचे कौटुंबिक मित्र घनश्याम यांच्या मुलीशी, प्रेरणाशी लग्न करण्यासाठी त्याला राजी केलं होतं.

आईनं म्हटलं, ‘‘हे बघ पंकज, खूप जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेस तू. वडिलांचं आजारपण निस्तरलंस, माझी सेवा करतोस, धाकट्या बहिणीचं लग्न करून दिलंस, धाकट्या भावाचं शिक्षणही होतंय, तोही आता नोकरीला लागेल. आता तुला लग्न करावंच लागेल.’’

‘‘आई…पण…’’

आईनं पुढे बोलूच दिलं नाही, ‘‘तू फक्त हो म्हण, मी लगेच घनश्यामना फोन करते.’’ अन् पुढे सगळं रीतसर घडलं.

प्रेरणानं नववधू बनून माप ओलांडले अन् घरात प्रवेश केला. पंकजचा मितभाषी अन् गंभीर स्वभाव यामुळे ती त्याच्यापासून थोडी दूरच असायची, पण समवयस्क अन् खेळकर, हसऱ्या धाकट्या दिराशी मात्र तिची लगेच मैत्री झाली. घरात ती धाकटी होती, इथं तिला अंबुजच्या रूपात धाकटा भाऊ मिळाला. अंबुजलाही ती आईच्या मायेनं काळजी घेणारी अन् बरोबरीनं वागणारी ताई वाटायची. अत्यंत मनोज्ञ अन् निर्मळ नातं होतं. दोघांमध्ये प्रेरणाला हलके फलुके विनोदी सिनेमे आवडायचे. पंकजला गंभीर विषयावरचे सिनेमे आवडायचे. तो म्हणायचा, ‘‘प्रेरणा, तू अन् अंबुज जा, सिनेमा बघून या. मी आलो तरी मी एन्जॉय करू शकणार नाही अन् त्यामुळे तुमचाही विरस होईल,’’ त्यामुळे प्रेरणा अन् अंबुज जास्त काळ एकत्र राहत.

मुळात पंकजचा स्वभावच वेगळा होता. आपण बरं आपलं काम बरं. फारसे मित्रही नव्हते त्याला. अंबुजचं दादावर खूप प्रेम होतं. दादानं केलेला त्याग त्याला ठाऊक होता. म्हणूनच तो दादाचीही खूप काळजी घ्यायचा.

वहिनीच्याबरोबर शॉपिंगला जायचा. तिला तिच्या मैत्रीणीकडे स्कूटरवरून पोहोचवायचा. एकूण तसं बरं चाललं होतं.

कधी कधी प्रेरणा म्हणायची, ‘‘मी जर दोनतीन वर्षांनी लहान असते ना, तर आईंनी माझं लग्न अंबुडबरोबरच ठरवलं असतं. कारण आमच्या स्वभावात खूप समानता आहे. पण पंकजशी मला जोडून ठेवण्याचं काम अंबुज करतो आहे. त्याच्यामुळे मला पंकजलाही सांभाळायचं कसं हे समजलं आहे अन् आमचा संसार चांगला चालला आहे.’’

शेवटी एकदाचं प्रेरणा अन् अंबुजच्या प्रयत्नांना यश आलं अन् कानपूरला शिफ्ट व्हायला पंकज तयार झाला.

‘‘दादा, इथं सगळीकडे आईच्या आठवणी विखुरल्या आहेत. त्यामुळे पदोपदी तिची आठवण होते. वहिनीही सैरभैर होते…आपण तिथंच काहीतरी करूयात,’’ निघताना अंबुजनं म्हटलं.

कानपूरला भाड्याचं घर घेतलं. प्रेरणानं नोकरी सुरू केली. प्रेरणाच्या वडिलांच्या पत्र्यावर शेड घालून दोघं भाऊ कामाला लागले. ‘‘कार एव्हरी सोल्युशन’’ नावाचं त्यांचं गॅरेज खूपच छान चालायला लागलं. मोटर पार्ट्सची फॅक्टरी घातली. त्यानंतर ‘ग्रीन कॅब’ आणि कार डेकोरचा बिझनेसही सुरू झाला. तीन वर्षांत तर उत्तम जम बसला. पंकजही आता खुलला होता. मोकळेपणाने बोलू हसू लागला होता. दोघं भाऊ मेहनत करत होते.

‘‘वहिनी, आमचं काम आता छान सुरू आहे. तुझ्या प्रेरणेनंच हे सर्व झालंय. तू खरी प्रेरणा आहेस, आता तू नोकरी सोड. आता मला ‘काका’ म्हणणारी एक गोड छकुली घरात येऊ दे,’’ प्रेरणाला सोफ्यावर बसवत अंबुजनं म्हटलं.

‘‘तसंच होईल अंबुज, आधी माझ्यासाठी जाऊ आण. एकदा ती घरात आली की मग मी आराम करणार. मग आपल्या घरात तुला काका म्हणणारी छकुली येईलच आणि तुला बाबा म्हणणारा छकुलाही आणूयात,’’ प्रेरणानं हसंत हसंत म्हटलं.

एव्हाना ते भाड्याचं घर सोडून स्वत:च्या घरात राहायला आले होते.

‘‘केवढं मोठं अन् सुंदर घर आहे…घरात राहायला माणसं मात्र तिनच आहेत. घरातल्या माणसांची संख्या वाढायला हवी. सण, समारंभ, उत्सव साजरे व्हायला हवेत. आता अंबुज तू लग्नाला नाही म्हणू नकोस. इतकी स्थळं सांगून येताहेत, लग्न व्हायला हवं…’’ अंबुजकडे रोखून बघत प्रेरणा म्हणाली.

अंबुज थोडा गडबडला होता. प्रेरणानं म्हटलं, ‘‘मला ठाऊक आहे. तुला सुरूची आवडते. खरं ना? मी अन् पंकज आजच त्यांच्या घरी जाऊन बोलणी करतो…अरे? लाजतोस काय?’’ प्रेरणाला गंमत वाटली अन् हसायलाही आलं. अंबुज खरोखरच लाजला होता.

प्रेरणाच्या लग्नानंतर सहा वर्षांनी सून म्हणून सुरूचीनं घरात प्रवेश केला. प्रेरणाला एक मुलगी झाली. सुरूवातीला सर्व ठिकठाक होतं. पण हळूहळू सुरूचीच्या कुरबूरी  वाढायला लागल्या. तिला प्रेरणाचं वर्चस्व सहन होईना. अंबुज प्रत्येक काम प्रेरणाला विचारून करतो, तेही तिला खटकायचं. कुठंही ती दोघं बाहेर जायला निघाली की प्रेरणासोबत असायचीच. प्रेरणा अन् अंबुजच्या नात्याचा अंदाज नव्हता. सुरूचीला अन् त्यातून हलंके कान अन् संशयी स्वभाव त्यामुळे ती सतत चिडचिडलेली असायची. तिला त्यांची जवळीक सहन होत नव्हती.

त्याबाबतीत तिनं अंबुजला हटकलंही होतं, पण अंबुजनं तिलाच समाजावलं, ‘‘मनातलं कलुष काढून टाक. तुला वाटतं तसं काही नाहीए. स्वच्छ मनानं आमच्या नात्याकडे बघ. ती माझी आई, ताई आणि मित्र आहे.’’

अंबुजसमोर सुरूची गप्प असायची, पण प्रेरणाला सतत टोमणे मारायची. घरात कलह नको म्हणून प्रेरणा तिकडं दुर्लक्ष करायची. अंबुजपासूनही ती आता थोडी दूर राहात होती. सुरूची व अंबुजना अधिकाधिक एकत्र राहता यावं म्हणून प्रयत्न करायची.

सुरूचीनं आता आपला मोर्चा पंकजकडे वळवला. एकदा संधी साधून तिनं पंकजला म्हटलं, ‘‘दादा, तुम्ही फार सरळ अन् भाबडे आहात. कामातच इतके मग्न असता की घरात काय घडतंय त्याकडे तुमचं लक्ष नसतं.’’

पंकजनं विचारलं, ‘‘तुला काय म्हणायचं आहे?’’

सुरूचीनं मनातलं सगळं विष बाहेर ओकलं. तिची भाषा, तिचे आरोप ऐकून पंकज तर भडकलाच. इतकं घाणेरडं मनात तरी कसं येतं तुझ्या? अगं, अंबुज तिचा धाकटा भाऊ अन् मित्र आहे. आमच्या घरात तिनंच आनंद आणलाय. तिही त्याला मान देते. तो तर तिला आईच्या जागी मानतो. ती दोघं घरातली जबाबदारी बघतात. म्हणूनच मी बिझनेस इतका वाढवू शकलो. खरं तर आम्हाला तुझ्या मदतीची अपेक्षा होती. तू प्रेरणाच्या जोडीनं घरातली जबाबदारी घे, जेणेकरून अंबुज धंद्यातली मोठी जबाबदारी घेऊ शकेल.’’ त्याचा चढलेला आवाज ऐकून प्रेरणा तिथं आली. पंकजला इतका संतापलेला बघून ती घाबरली.

‘‘काय झालं, पंकज?’’ तिनं विचारलं.

अंबुजही तेवढ्यात आला. सुरूचीनं दादाला नको ते सांगितलं असणार, ते सहन न होऊन दादा भडकला हे त्यानं ओळखलं.

‘‘सुरूची, आधी दादा वहिनीची क्षमा माग. अशी संशयी पत्नी मला नको,’’ तो सुरूची जवळ जात म्हणाला.

‘‘अंबुज, तिच्यावर ओरडू नकोस, ती आपल्या घरात नवी आहे. तिला सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे. तुझं अन् माझंही थोडं चुकलंच. सुरूची अन् तू एकमेकांना समजून घेण्याच्या काळात मी सतत तुमच्यासोबत राहणं योग्य नव्हतं. खरं तर तुमच्या लग्नानंतर मी पंकजला म्हटलं होतं की यांना वेगळं घर करू देत. त्यांना त्यांचं लाइफ, त्यांची प्रायव्हसी मिळू देत.’’ प्रेरणानं म्हटलं.

‘‘होय सुरूची, होय अंबुज, प्रेरणानं मला खरंच म्हटलं होतं. पण मीच तिला समजून घ्यायला कमी पडलो. प्रेरणानं हट्ट धरला अन् तुमच्या लग्नाच्या वाढदिवसालाही गिफ्ट म्हणून फ्लॅट घेतला. तुम्ही दोघांनी सुखी व्हावं ही तिची इच्छा होती, आहे. म्हणूनच तिनं दोन बिझनेसही अंबुजच्या नावानं वेगळे करून दिलेत हे बघ…’’ पंकजनं म्हटलं.

त्यानं कपाटातून सगळी कागदपत्रं काढून सुरूचीच्या समोर ठेवली. ‘‘सुरूची, तुझा नवा फ्लॅट सुसज्ज आहे. ही त्या घराची किल्ली अन् हा तुमचा बिझनेस…अगदी आजही तुम्ही वेगळे होऊ शकता. फक्त एकमेकांवर प्रेम करा, आनंदात राहा,’’ पंकजचा कंठ दाटून आला.

‘‘दादा, वहिनी, मला क्षमा करा. मी फार फार चुकले. तुमचा मोठेपणा, निर्मळ मन, त्याग, कष्ट, हे सगळं समजून घ्यायला मी कमी पडले. मी मनापासून क्षमा मागते. मला क्षमा करा.’’ सुरूचीनं अक्षरश: त्या दोघांचे पाय धरले.

अंबुज पाणावलेल्या डोळ्यांनी हे सर्व बघत होता. ‘‘अंबुज भाऊजी, रडायचं नाही. आपण जवळच आहोत. मनात येईल तेव्हा आपण एकमेकांकडे जायचं. मदतीला धावायचं.’’ प्रेरणानं म्हटलं अन् मग सुरूचीला जवळ घेत ती प्रेमानं म्हणाली, ‘‘माझा बंधुसखा असला तरी पती तुझाच आहे, त्याची हृदयस्वामिनी तूच आहेस. मलाही तू प्रिय आहेस…मनातलं किल्मिष काढून टाकलंस हे छान झालं.’’

सगळ्यांचेच चेहरे प्रसन्न हास्यानं उजळले होते.

मला क्षमा कर

कथा * सुशीला दानवे

दुपारपासूनच पाऊस लागला होता. थांबायचं नाव घेत नव्हता. घरात शांतता होती. खोलीत तर विशेषच नमिताला कधी कधी अशी शांतता हवीशी वाटायची. रेडिओ, टीव्ही, डेक सगळं बंद करून आपल्याच विचारात मग्न राहायला तिला आवडायचं.

आपल्यातच मग्न असताना तिला वाटलं शेजारच्या खोलीत काही आवाज झाला. लक्षपूर्वक पुन्हा ऐकलं. नंतर काहीच आवाज आला नाही. आपल्याला एकटेपणाचं भय वाटलं की काय असं तिच्या मनात आलं. पावसामुळे बाहेरही अंधारून आलं होतं?

नमितानं खिडकीतून बाहेर बघितलं, त्याचवेळी पुन्हा तिला काहीतरी आवाज ऐकू आला. अंधारातच तिनं सर्वत्र नजर फिरवली. तिनं दार बंद करताना व्यवस्थित बंद केल्याचं तिला आठवत होतं. चुकून कडी घालायची राहिली का?

घराबाहेर पडताना आईनं बजावलं होतं, ‘‘घराच्या खिडक्या, दारं नीट बंद कर हं.’’

तिनं हसून आईला ऐकवलं होतं, ‘‘अगं मी आता काही लहानशी मुलगी नाहीए. वकील झालेय. पीएचडी करतेय. ज्युडो-कराटे शिकलेय. एखाद्या गुंडाला सहज लोळवीन.’’

तरीही आईनं बजावलं होतं, ‘‘तू एक मुलगी आहेस, स्त्री आहेस, मुलीला अब्रू जपावी लागते. समाजाला भिऊन राहावं लागतं.’’

‘‘आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी स्वत:ची नीट काळजी घेईन,’’ तिनं आईला आश्वस्त केलं.

आज तर ती घराबाहेरच गेली नव्हती. आईबाबा घराबाहेर पडले त्याला काही तासच झाले होते. ती असा विचार करते आहे तोवर तिला पुन्हा घरात कुणीतरी वावरतंय असा भास झाला. तिनं दिवा लावला. पण वीज गेली होती. तिला एकदम भीती वाटली.

ती मेणबत्ती घ्यायला उठली, तेवढ्यात वीज आली. पाऊस अजूनच जोरात कोसळू लागला. कदाचित पावसाच्याच आवाजानं तिला भास झाला असावा. अंधारामुळेही भीती वाढतेच. आत्ता फक्त सायंकाळचे सात वाजले होते.

तहान लागली होती, म्हणून नमिता उठली. स्वयंपाक घरात जाऊन तिनं तिथला दिवा लावला अन् फ्रीजकडे वळली अन् नकळत किंचाळली. ‘‘कोण आहेस तू?’’ कशीबशी ती बोलली.

काळ्या फडक्यात चेहरा झाकलेला तो कोणी पुरूष होता. त्यानं नमिताच्या तोंडावर हाताचा तळवा दाबून धरत धमकी दिली, ‘‘ओरडू नकोस. परिणाम वाईट होईल.’’ त्याचा हात ढकलत नमितानं म्हटलं, ‘‘काय हवंय तुला? कोण आहेत तू?’’

‘‘मूर्ख मुली…एखाद्या तरूण पुरूषाला तरूण मुलीकडून काय हवं असतं? बरेच दिवस तुला बघत होतो. आज संधी मिळाली.’’

त्याच्या हातातून स्वत:ला सोडवून घेत नमितानं त्याला म्हटलं, ‘‘बडबड बंद कर. मी तुला घाबरत नाही. ताबडतोब इथून चालता हो. मी पोलिसांना बोलावतेच.’’ पण ती फोनपाशी पोहोचण्याआधीच त्यानं तिला धरलं अन् उचलून पलंगावर टाकलं. तो तिचे कपडे फाडायचा प्रयत्न करत असतानाच नमिता त्याला चावत, बोचकारत होती. तिनं आपल्या दोन्ही पायांनी त्याच्या मांड्यांच्या मधोमध एक जबरदस्त प्रहार केला. तो एकदम कळवळला. दूर जाऊन पडला. विजेच्या वेगानं उठून नमिता खोलीबाहेर धावली. तिनं खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. नमितानं ड्राँइंगहॉलमधून पोलिसांना फोन केला. पोलिसही लगेच आले. पण खोलीचं दार उघडलं, तेव्हा खोलीत कोणीत नव्हतं. खिडकीचे गज वाकवून तो धटिंगण पसार झाला होता. खोलीतल्या एकंदर अवस्थेवरून नमितानं किती जोरदार प्रतिकार केला होता हे सहज कळत होतं.

आईबाबांना कळवताच तेही टॅक्सीनं ताबडतोब आले. आईच्या गळ्यात पडताच नमिताला रडू फुटलं.

तिच्या चेहऱ्यावर हातापायावर ओरखडे होते. मुक्कामाराचे निळे डाग होते.

नमितानं आईवडिलांना, पोलिसांना पूर्ण हकीगत सांगितली. ‘‘आई, माझं ज्युडोकराटेचं ट्रेनिंग माझ्या कामी आलं. मीही त्याला सणसणीत लाथ घातली. चावले, बोचकारलं…स्वत:ला सही सलामत वाचवू शकले.’’ नमिता आता सावरली होती.

पण प्रेसला कशी, कोणी विकृत बातमी दिली, कुणास ठाऊक. वणवा पसरावा तशी बातमी पसरली. मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी. आईवडिल हादरले…खरंच बलात्कार झाला का? नमितानं तर तसं सांगितलं नाही.

नमितानं आईवडिलांना सांगितलं, ‘‘माझ्यावर विश्वास ठेवा. बातमी कुणी, कशी दिली मला ठाऊक नाही, पण तसं काहीच घडलं नाहीए. मीच त्याला धडा शिकवलाय. माझ्यावर विश्वास नाही का?’’

आईबाबा अजूनही घाबरलेले, चिंताक्रांत होते. ‘‘ही बातमी घरोघरी वाचली जात असेल…आमच्या मुलीबद्दल लोक काय काय बोलतील…मला फार भीती वाटतेय,’’ आई बाबांना म्हणत होती.

तेवढ्यात फोनची घंटी वाजली. लोक सहानुभूती दाखवत होते. दु:खात सहभागी असल्याचं सांगत होते.

‘‘आम्हाला आमच्या मुलीच्या कतृत्त्वाचा अभिमान वाटतोय. तिनं त्या धटिंगणाला धडा शिकवला. पेपरनं चुकीची बातमी दिली आहे,’’ आई बाबा प्रत्येकालाच सांगत होते.

सायंकाळ होता होता योगेशचा फोन आला. त्याच्या मुलाशी नमिताचं लग्न ठरलं होतं. डिंसेंबरमध्ये लग्न व्हायचं होतं.

‘‘पेपरला बातमी वाचली. वाईट वाटलं. मी नंतर फोन करतो.’’

त्यांच्या बोलण्याच्या एकूण पद्धतीवरून बाबा घाबरले, विचलित झाले. आईला म्हणाले, ‘‘पेपरच्या या बातमीनं आपला सत्यानाश केलाय. योगेशजींचा फोन होता. त्यांच्या बोलण्याची पद्धत विचित्र वाटली. ते म्हणाले, ‘‘तुम्ही आता वाईट मन:स्थितीत असाल, मी तुमचा त्रास वाढवत नाही…नंतर बोलतो.’’

पोलीस आणि मिडियावाले घरी येतच होते, ‘‘आम्ही नमिताचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो.’’

‘‘इतकं गलिच्छ खोटं नाटं छापूनही समाधान झालं नाही का? मुलीनं स्वत:ला वाचवलं, त्या दुष्टाला हाणलं ते पुरेसं नाही का?’’

मिडियावाले मुकाट झाले. पण पोलीस म्हणाले, ‘‘तसं नाही सर, आम्हाला गुन्हेगार पकडायचा आहे. नमिता मॅडमनं त्याला ओळखायला आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे.’’

‘‘पोलिसांना बोलावून तू फार मोठी चूक केली आहेस पोरी, किती त्रास होतोय,’’ वैतागून बाबा म्हणाले.

‘‘पण बाबा, अन्यायाला वाचा फोडायला हवी असं तुम्हीच म्हणता ना?’’ नमितानं त्यांना शांत करत म्हटलं. ‘‘खरं काय घडलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना?’’

‘‘नाही गं पोरी, नाही. केस फाइल करून तू घोळ केला आहेस. त्याचे परिणाम बघते आहेस ना? सगळीकडे बातमी पसरली आहे. अशा घटनांची वाच्यताच करायची नसते.’’

बाबांचं बोलणं ऐकून नमिताला गरगरायला लागलं. ‘‘हे काय बोलताय बाबा? सत्यवीर कर्मवीर असलेल्या माझ्या बाबांच्या मनात असले विचार असतील असं वाटलं नव्हतं मला. तुम्ही मला अन्याय, अत्याचार लपवायला सांगताय? बाबा, तुम्हीच म्हणायचा ना, की मी माझ्या मुलींना हुंड्यात देणार आहे उच्च शिक्षण, उच्च विचार, निर्भयता अन् अन्यायाविरूद्ध बोलायची, लढायची ताकद अन् आज मी पूर्ण क्षमतेनं शरीरबळ, आत्मबळ वापरून स्वत:ला सिद्ध केलंय तर माझं कौतुक करण्याऐवजी, मला आधार देण्याऐवजी माझा धिक्कार करताय? लोकांच्या बोलण्याला घाबरता? स्वत:च्या मुलीवरच अविश्वास दाखवताय? ’’

ग्वाल्हेरच्या मेडिकल कॉलेजात शिकणारी नमिताची धाकटी बहिण रीतिका घरी आली होती. तिनं मिठी मारून ताईचं कौतुक केलं. तिच्या येण्यानं, तिच्या धीरानं थोडं बरं वाटलं.

आईबाबांना वाटणारी भीती शेवटी खरी ठरली. फोनवरच योगेशजींनी अत्यंत नम्रपणे पण ठामपणे नमिता आणि प्रांजलचं लग्न मोडल्याची बातमी सांगितली. त्यांच्यावर जणू वजाघात झाला. आई नमितावरच ओरडली, ‘‘स्वत:च्या शौर्याची अशी दवंडी पिटवून काय मिळालं तुला? सुरक्षित राहिलीस, तेवढं पुरेसं नव्हतं? विनाकारण ठरलेलं लग्न मोडलं…’’

‘‘बरं झालं ना आई, त्यांची संकुचित विचारसरणी आधीच कळली ते. लग्नानंतर असं काही घडलं असतं तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का? पण त्यांना तरी कशाला दोष द्यायचा? माझीच माणसं जिथं मला परकी झालीत, तिथं इतरांचं काय?’’ बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला.

नमिताला कळत नव्हतं की तिचं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे. अविश्वासाचं मळभ दाटून आलेलं. तिच्या बोटात अजूनही साखरपुड्याची अंगठी होती. ती अंगठी प्रांजलनं तिच्या बोटात घातली, तेव्हा त्याचा झालेला स्पर्श, त्यातील प्रेम, आपुलकी, त्यामुळे देहावर उठलेलं रोमांच…सगळं सगळं खोटं होतं का? किती स्वप्न बघितली होती तिनं. अजूनही ती हिऱ्याची अंगठी तिच्या अनमिकेत होती. पण या क्षणी तिला त्या हिऱ्याची बोच असह्य वाटली. नाती इतकी तकलादू असतात का? न घडलेल्या घटनेमुळे ती तुटतात?

या एका घटनेनं विश्वासाची भावना पार धुळीला मिळाली. प्रांजलच्या आईवडिलांचं जाऊ दे. त्यानंतरही निदान एकदा भेटायचं, बोलायचं, सत्य जाणून घ्यायचं? तोही इतक्या क्षुद्र मनोवृत्तीचा निघावा?

आज आठ दिवसांनी नमिता घराबाहेर पडत होती. युनिव्हर्सिटीत जाऊन बघायचं होतं. मित्रमैत्रिणी, शिक्षक, सहकारी कशी काय प्रतिक्रिया देतात.

तिला आवरून घराबाहेर पडताना बघितलं अन् आई बोललीच, ‘‘अगं, इतक्यात अशी तयार होऊन बाहेर पडू नकोस. घटना जरा जुनी झाली की लोकांना विसर पडतो.’’

नमिता संतापलीच, ‘‘कोणती घटना? काय झालंय? तू विनाकारण का माझ्या मागे असतेस आई? अगं असं वागून तू मला किती दुखावते आहेस, हे कळतंय का तुला? तुझं सगळं प्रेम, माया, ममता कुठं गेली गं?’’ अन् मग शांत होऊन ती म्हणाली, ‘‘आई, जे होईल ते सोसायला मी समर्थ आहे. तू उगीच माझी काळजी करू नकोस.’’

युनिव्हर्सिटीत सगळ्यांनीच तिच्या धाडसाचं कौतुक केलं. कुणालाही तिच्यावर अविश्वास दाखवावा असं वाटलं नाही. नमिता सुखावली. तिनं पीएचडीचा प्रबंध पूर्ण केलाच होता. लवकरच तिला डॉक्टरेट मिळणार होती. आता तिनं प्रशासनिक सेवेच्या परीक्षेसाठी कंबर कसली. समाजात स्वत:ला सिद्ध करायला पॉवरही हवीच.

जे ठरवलं ते मिळवायचं हा तिचा स्वभाव होता. तिनं कठोर परिश्रम केले अन् पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी छापून आली. ‘भारतीय प्रशासनिक परीक्षेत डॉ. नमिता साठे यांना प्रथम क्रमांक मिळाला.’

आता तिचे प्रचंड कौतुक सुरू झाले. आईबाबाही आनंदले. पण तिला जवळ घेऊन कौतुक करू शकले नाही. त्यांच्यात पडलेली दरी साधली जात नव्हती. ज्या क्षणी तिला आधाराची अत्यंत गरज होती, तेव्हाच त्यांनी तिला दूर लोटली होती हे शल्य नमिताही विसरू शकली नव्हती.

उत्तम अधिकारी म्हणून ती नावाजली जात होती, पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकत होतं. काय ते तिला समजत नव्हतं. तिला लक्षात आलं, त्या काळात तिनंही स्वप्नं बघितलं होतं, उत्तम पत्नी, उत्तम गृहिणी, उत्तम सून, उत्तम आई होण्याचं. आपलं प्रेम, आपल्यातली माया, ममता तिला आपल्या कुटुंबावर उधळायची होती. पण ते झालंच नाही. कधीमधी रात्रीच्या अंधाऱ्या एकांतात ती रडून घ्यायची. आपल्या भावनांना वाट करून द्यायची. पण आता तिला नाती गोती नको होती. तिचा विश्वासच उडाला होता.

पण तिला खूप स्थळं सांगून येत होती. आईवडिल लग्न करण्यासाठी सतत दबाव आणत होते. स्थळ नाकारू नये म्हणून विनवत होते. पण तिने स्पष्टच सांगितलं, ‘‘या विषयावर पुन्हा बोलायचं नाही. मला संसार करायला वेळ तरी कुठं आहे? मी अशीच सुखात आहे.’’

पण कधी कधी कथा कांदबरी किंवा सिनेमात शोभावेत असे प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात. कामाच्या निमित्तानं नमिताला खूप प्रवास करायला लागायचा. एकदा अशीच ती दिल्लीला निघाली होती. सामान व्यवस्थित लावून तिनं वाचायला सुरूवात केली.

गाडी सुटायला काही क्षणांचा अवधी असतानाच कुणी प्रवासी डब्यात चढले अन् सामान नीट लावू लागले. सहजच नमिताचं लक्ष गेलं. ती दचकलीच! तो प्रांजल होता. क्षणांत तिनं निर्णय घेतला, आपली जागा बदलायला हवी.

त्याच क्षणी प्रांजलचंही तिच्याकडे लक्ष गेलं. त्याचा चेहरा आनंदानं उजळला. कुठलीही प्रस्तावना न करता तो एकदम म्हणाला, ‘‘मला याच चमत्काराची प्रतीक्षा होती नमिता…मी वाट बघत होतो आपल्या भेटीची.’’

नमितानं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. पण प्रांजल मात्र आपली बाजू मांडण्यासाठी उतावीळ आणि आग्रही होता.

नमिताला बोलायची संधी न देता तो बोलू लागला, ‘‘तू यू.पी.एस.सीत पहिली आलीस त्या दिवशीच खरं तर तुझं अभिनंदन करायचं होतं. पण माझं धाडस झालं नाही. मी तुझा अपराधी आहे. मी भ्याड, भित्रा होतो गं…पण मीही तुझ्यासारखीच मेहनत घेतली अन् प्रशासनिक अधिकारी झालो. मनात होतं, आपली नक्की भेट होईल. तसे आज भेटलो, मला क्षमा कर. तू धाडसी आहेस. मी मात्र कमी पडलो…’’ त्याच्या देहबोलीत, चेहऱ्यावर, बोलण्यात पश्चात्ताप अन् क्षमायाचना होती.

‘‘माझ्या आईनं बाबांना सांगितलं की तिला अशी धाडसी सून नकोय. सरळसाधी संसार करणारी सून हवीय. शेवटी बाबांना फोन करावा लागला. मी तुला भेटायला येणार होतो, पण आईनं ‘जीव देईन’ अशी धमकी दिली. शेवटी मी ही सांगितलं ठिक आहे. मी आत्ता भेटत नाही, पण मी कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही. मनात ठरवलंच होतं की तुझ्याशिवाय माझी पत्नी इतर कुणी असूच शकत नाही. माझ्या प्रतिज्ञेमुळे आईही गोंधळली आहे. तिला आता आपली चूक उमगली आहे. पण तरीही मी तुला भेटायचं धाडस करू शकलो नाही.’’

नमिता दगडी मूर्तीसारखी निश्चल बसली होती. खरं तर तिला प्रांजलला सांगायचं होतं की तिचं हृदय आता कोरडं वाळवंट आहे. प्रेमाचे झरे पार आटले आहेत. स्त्रीसुलभ प्रेमळपणा, सौम्यपणा, साधेपणा सगळं आता ती विसरली आहे. प्रांजलनं यापुढे तिच्याशी संपर्क करू नये. पण ती काहीच बोलली नाही.

प्रांजलच्या बोटात आजही साखरपुड्याची अंगठी होती. प्रांजलने खरोखर आपलं हृदय तिच्यापुढे उघडं केलं होतं. पुढला प्रवास नि:शब्दपणेच झाला.

त्यानंतरच्या आठवड्यात नमिता ऑफिसातून घरी आली, तेव्हा प्रांजलचे आईवडिल ड्रॉइंगरूममध्ये बसलेले तिला दिसले. किती तरी वर्षांत आईनं उत्साहानं, प्रेमानं उच्चारलेले शब्द तिच्या कानावर आले, ‘‘नमिता, अगं, बघ तरी कोण आलंय…’’

‘‘या दोघांनीच ही किमया केलीय बहुतेक. तरीच आईच्या मनातलं किल्मिष नाहीसं झालंय.’’ मनांतल्या मनात म्हणत नमिता त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. आयुष्यातत त्यांची तोंडं बघणार नाही असं तिनं ठरवलं होतं, त्याच माणसांना तिला सामोरं जावं लागलं.

प्रांजलची आई पटकन् उठली. नमिताचे हात आपल्या हातात घेऊन तिनं नमिताला शेजारी बसवलं. तसेच तिचे हात धरून ती म्हणाली, ‘‘मला क्षमा कर मुली. तुझ्यासारखी हिरकणी आमच्या नशिबानं लाभली होती, पण आम्हालाच पारख करता आली नाही. आमचं चुकलं माझ्या मुलाचं दु:ख, त्याचा संताप मला बघवत नाहीए. माझं अज्ञान, माझा अहंकार, माझी चूक या सगळ्याचं प्रायश्चित्त माझ्या मुलाला भोगावं लागतंय. मी तुझी अपराधी आहे, माझा मुलगा नाही. मला एक संधी दे…मी क्षमा मागते तुझी,’’ बोलता बोलता त्या खूपच भावनाविवश झाल्या. प्रांजलच्या वडिलांच्याही चेहऱ्यावर तेच भाव होते. नमिताला कठोर होता आलं नाही. काही न बोलता ती उठून आतल्या खोलीत निघून गेली.

त्या रात्री तिला झोप येईना. ट्रेनमध्ये क्षमा मागणारा, स्वत:ची चूक कबूल करणारा प्रांजल पुन्हापुन्हा डोळ्यांपुढे येत होता. मधल्या काळात तो भेटून गेला नाही याचा राग आता उरला नव्हता. कारण आपण भ्याडपणे वागलो हे त्यानं प्रांजळपणे कबूल केलंच होतं. आता त्याचे आईवडिलही क्षमा मागून गेले होते. ती तरी त्यांच्यासमोर कुठं रौद्ररूप दाखवू शकली होती? नमिताला रडू यायला लागलं. बराच वेळ रडून झाल्यावर तिला मोकळं वाटलं. मग झोपही लागली.

आठ दिवसांनी आई तिच्याजवळ येऊन बसली. ‘‘इतके दिवस तुला विचार करायला वेळ दिला. आता एकदा काय तो निर्णय घेऊन टाक गं! योगेश पुन्हापुन्हा फोन करताहेत…आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं?’’ आई आशेनं तिच्याकडे बघत होती.

तिनं आईकडे बघितलं अन् उठून उभी राहत ती सहजपणे म्हणाली, ‘‘तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी तयार आहे.’’

आई आनंदानं, समाधानानं उठून जाण्याऱ्या लेकीकडे बघत राहिली. घरात पुन्हा एकदा आनंद दाटला. दुसऱ्याच दिवशी आईबाबा लग्नाची तारीख ठरवण्यासाठी इंदौरला निघून गेले.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें