कथा * दीपा थोरात

‘‘ऐकतेस ना? ती पॉलिसीवाली ब्रीफकेस जरा आणून दे ना रीमा…’’ बैठकीच्याखोलीतून विवेकनं हाक मारली.

रीमा ओले हात पुसत पुसत बाहेर आली, ‘‘मला आत नीट ऐकायला आलं नाही, काय म्हणताय?’’

‘‘अगं, ती विम्याच्या फायलींची सूटकेस हवी आहे.’’ विवेक म्हणाला. तेवढ्यात आतून कुकरच्या दोन शिट्या पाठोपाठ ऐकायला आल्या. ‘‘बघ, बघ, तुला तुझा मित्र बोलावतोय…शिट्या वाजवतोय…’’ विवेकनं हसून मस्करी केली.

‘‘भलत्या वेळी कसली चेष्टा? माझं कामं संपेनात अन् तुम्ही मध्येच हाक मारता.’’

‘‘अगं, हे कामही महत्त्वाचंच आहे. पॉलीसी मॅच्युअर झाली की क्लेम करता येईल.’’

‘‘खरंच? मग कुठं तरी फिरायला जाऊयात का?’’ खूपच उत्सुकतेनं रीमानं विचारलं.

‘‘आणि ऋचालीच्या लग्नाचं काय?’’ विवेकनं विचारलं.

‘‘अजून लहान आहे ती. दोन तीन वर्षं तरी अजून तिचं लग्न नाही करणार.’’

‘‘पण त्यानंतर तरी कोणती लॉटरी लागणार आहे? हाच पैसा तिच्या लग्नासाठी जपून ठेवावा लागेल. लगेच पुढे दोन तीन वर्षांत लेकाचंही लग्न करावंच लागेल ना? आता पोरांची लग्नं की आपला दुसरा हनीमून तूच ठरव.’’ ब्रीफकेस उघडून फायलींमधले कागद बघत विवेकनं म्हटलं.

रीमा काही न बोलता आपल्या कामाला लागली. खरंच दिवस किती भराभर संपतात, वर्षांमागून वर्षं सरतात. रीमाच्या लग्नाला पंचवीस वर्षं झालीत. लग्न झालं तेव्हा ती फक्त एकोणीस वर्षांची होती. साखरपुडा ते लग्न यात सहा महिने वेळ होता. लग्नाला होकार द्यावा की नकार हेच तिला ठरवता येत नव्हतं. विवेकचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, त्याची चांगली नोकरी भुरळ घालत होती. पण तिचं आत्तापर्यंतचं आयुष्य लखनौसारख्या शहरात, चांगल्या वस्तीत, मोकळ्या वातावरणात गेलं होतं. लग्नानंतर तिला कानपूरपासून बऱ्याच आत असलेल्या एका छोट्याशा गावात, जुनाट वळणाच्या घरातल्या एकत्र कुटुंबात राहावं लागणार होतं. ते तिला पचनी पडत नव्हतं. स्वप्नं सोनेरी होतं. पण त्यावर विद्रुप डागही होते.

शेवटी एकदाची लग्न होऊन ती सासरी आली. अजून तिचं पदवीचं एक वर्ष शिल्लक होतं. इथल्या त्या कोंदट वातावरणात तिचा जीव घाबरा व्हायचा. तिनं विवेककडे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली. या निमित्तानं तिला माहेरी जायला मिळायचं. डिग्री पूर्ण झाली मग तिनं कॉम्प्युटरचा डिप्लोमाही करून टाकला. विवेक तिला भरपूर पाठिंबा देत होता. बालवाडीचाही एक कोर्स तिनं तेवढ्यात उरकून घेतला. लग्नाला पाच वर्षं झाली तोवर पदवी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, बालवाडीचं सर्टिफिकेट अन् ऋचा अन् रोहन अशी दोन बाळं तिच्या पदरात होती. सासरच्या घरात सासू, सासरे, दोघं दीर, दोन जावा, त्यांची चार मुलं अन् एक सतत घरात असणारी मोलकरीण अशी चौदा माणसं होती. घर एकत्र होतं. स्वयंपाक एकत्रच असायचा. शेतातून धान्य, भाज्या मिळायच्या. वरकड खर्चाला सासऱ्यांची पेंशन अन् तिन्ही भावांकडून आईला दर महिन्याला खर्चाची रक्कम मिळायची. दोन्ही जावांचं कामावरून भांडण व्हायचं. रीमा न बोलता चटचट कामं उरकायची. तिचं सुंदर रूप, कामाचा उरक, शिक्षण, येणाऱ्यांशी चांगलं वागणं, बोलणं यामुळे थोडक्या काळात ती सर्वांची लाडकी झाली होती. पण तिच्या एकूणच बुद्धिनं, रूपानं सुमार असलेल्या जावा तिचा सतत दुस्वास करायच्या. त्या दोघी कायम एक असायच्या. पण रीमा हसून साऱ्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. दरम्यानच्या काळात विवेकला दिल्लीला नोकरी लागली. रीमाला वाटलं, बरं झालं, या जंजाळातून मुक्ती मिळाली. पण विवेकनं तिला दिल्लीला घर करणं आता जमणार नाही हे समजावून सांगितलं. तिनंही ते समजून घेतलं.

विवेक औषधांच्या कंपनीत एरिया मॅनेजर होता. रीमाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या गावात हल्ली बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. तालुक्याचा दर्जा गावाला मिळाला होता. नवीन शाळाही उघडली होती. दोन्ही मुलांचे एडमिशन्स तिथं झाले अन् रीमालाही तिथं कॉम्प्युटर टीचर म्हणून नोकरी मिळाली. विवेकनं तिला आईवडिलांकडून नोकरीची परवानगी मिळवून दिली. दोन्ही जावांचा जळफळाट झाला. त्यांनी सासूचे कान भरायचा प्रयत्न केला. पण सासूला दोन्ही वेळा वेळेवर चहा अन् जेवण मिळण्याशी काम होतं. त्या वेळा रीमानं कधीच चुकवल्या नाहीत. पण घरातल्या एकूण वातावरणात तिचा जीव गुदमरायचा. अशात छोटूचं विनोदी बोलणं, त्याची तत्पर मदत यामुळे तिला ताज्या वाऱ्याची झुळुक मिळाल्याचा भास व्हायचा.

नाव छोटू असलं तरी तो लहान नव्हता. चांगला उंचबिंच लांबरूंद तरूण होता. त्याच्या बलवीर या नावानं त्याला कधीच कुणी हाक मारली नाही. अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं. कसा बसा मॅट्रिक झाला अन् मग समाज सेवेतच गुंतला. कुणाला इस्पितळात पोहोचव, कुणाचा गॅस सिलिंडर आणून दे, लग्नकार्यात स्वत: उभं राहून मांडव घालून दे, वांजत्रीवाला ठरवून दे अशी घरातली बाहेरची कामं सतत करायचा. घरची कार सतत तो दामटायचा. थोरले दोघं भाऊ कार चालवायला शिकलेच नाहीत. हक्काचा छोटू हाताशी होताच. छोटू त्याच्या आईवडिलांना उतार वयात झालेला. त्यामुळे त्यांचा छोटूवर फार जीव अन् आईबापांची संपत्ती आपलीच आहे हे छोटूनं ठरवूनच टाकलं होतं.

बोलणं वागणं अगदी नम्र होतं छोटूचं. हात जोडून उभा राहिला की समोरच्याला भरूनच यायचं. रीमाच्या सासऱ्यांच्या बॉसचा तो मुलगा. त्यांचाही छोटूवर जीव होता. दिवसभरात एक दोन फेऱ्या त्याच्या सहजच व्हायच्या.

रीमाला म्हणायचा, ‘‘वहिनी, तुमचं माझं वय जवळजवळ सारखंच असेल पण तुम्ही कधी रिकाम्या नसता अन् मी कायम रिकामाच असतो.’’

‘‘तर मग कर ना काही काम. निदान शाळेत जा. अकरावी, बारावी करून टाक.’’

‘‘नाही जमणार मला.’’

‘‘कॉम्प्युटरचा कोर्स कर. चांगली नोकरी मिळेल.’’

‘‘बरं बघतो. पण वहिनी तुम्ही खरंच खूप स्वीट आहात.’’

रीमाला हसायला आलं.

‘‘तुम्हाला ठाऊक आहे का? तुमचं हसणं वेड लावतं मला. तुम्हाला हसताना बघितलं की चेहऱ्यावरून नजर हलत नाही. मला तर विवेकदादाचा हेवाच वाटतो.’’

‘‘असं काही तरी बोलू नकोस.’’ रीमा रागावून म्हणाली.

‘‘खरंच सांगतोय मी. तुमचे डोळे. तुमचं हसणं एकदा कुणी बघेल, ऐकेल तर जन्मभर विसरणार नाही.’’

‘‘तू आता निघ अन् काहीतरी अभ्यास सुरू करशील तेव्हाच भेटायला ये.’’ रीमा त्याला हाकलायला बघत होती.

‘‘तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटतेय? मी खरं सांगतो. काय सुंदर फिगर आहे तुमची. दोन मुलांची आई तर वाटतंच नाही तुम्ही. लोकांना अजूनही वाटतंय तुम्ही लग्नाची मुलगी आहात म्हणून!’’

‘‘आता पुरे. तू निघ. मला संताप अनावर होईल असं काही बोलूही नकोस.’’ पटकन् तोडून टाकत रीमानं म्हटलं अन् ती सरळ आपल्या खोलीत निघून आली.

स्वत:च्या खोलीतल्या डे्सिंग टेबलसमोर उभी राहून तिनं आपल्या प्रतिबिंबाकडे बघितलं. ती खरोखर सुंदरच होती. लग्न झालं नसतं तर इतर मैत्रिणींप्रमाणे युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजातच पीएचडी करत असती. पण कॉलेजचं आयुष्य फारच लवकर संपलं. संसाराच्या रामरगाड्यात कसंबसं शिक्षण पूर्ण करू शकली. एक मात्र खरं की नवरा सतत तिच्या पाठीशी होता. त्यानं तिच्या शिक्षणाला प्रतिबंध केला नाही. संसार, मुलं सांभाळून अभ्यास करणं, परीक्षा देणं सोपं नक्कीच नव्हतं. पण ते तिनं जिद्दीनं केलं.

जुन्या आठवणी कशाला अन् किती काढायच्या म्हणत ती आरशासमोरून बाजूला झाली. पण मन मात्र भूतकाळातून बाहेर यायला तयार नव्हतं.

तिच्या माहेरी चुलत बहिणीचं लग्न होतं. विवेकपाशी खूप हट्ट करून त्याच्यासह ती मुलांना घेऊन माहेरी आली होती. स्वत:च्या लग्नातही ती ब्युटी पार्लरला गेली नव्हती. यावेळी मात्र नवरीच्या जोडीनं तिनंही सगळे सोपस्कार करून घेतले होते. नटूनथटून ती विवेकसमोर येऊन उभी राहिली, तेव्हा क्षणभर तो बघतच राहिला. मग जरा करडेपणानं म्हणाला, ‘‘इतकं नटायची काय गरज होती? लग्न तुझं नाहीए…’’

‘‘माझ्या बहिणीचं आहे. अन् आईबाबा, बाकीचे कुठं गेले? मुलं…?’’

‘‘सगळे टॅक्सीनं पुढे गेलेत. तुझं नटणं संपेना…घर लॉक करून या म्हणून सांगितलंय…दादाने त्याची बाईक ठेवलीय…आपण बाईकनं जाऊयात.’’ विवेकनं म्हटलं.

‘‘तर मग चला नं लवकर,’’ ती उतावळेपणानं म्हणाली.

‘‘बाइकची किल्ली तर आण. ती वर बेडरूममध्येच आहे.’’

माहेरच्या घरातली रीमाची खोली अजूनही तिच्यासाठीच राखून ठेवलेली असते.

‘‘प्लीज अहो, तुम्हीच आणा ना वरून? हा लेहंगा घालून जिना चढणं, उतरणं फार त्रासदायक होतं.’’ तिनं म्हटलं.

‘‘तर मग बसा घरीच.’’ विवेक म्हणाला.

रागानं रीमा उठली अन् जिना चढून खोलीत आली. पलंगावरच किल्ली होती. किल्ली उचलून ती वळतेय तोवर विवेकनं तिला मिठीत घेतली अन् दोघंही बेडवर कोसळली. विवेकच्या प्रेमाला उधाण आलं होतं.

‘‘अहो असं काय करताय? माझा सगळा मेकअप बिघडला ना? कसंबसं स्वत:ला सोडवून घेत रीमानं म्हटलं, लवकर निघायला हवं. सगळे तिथं वाट बघत असतील?’’

‘‘बघू देत वाट! मला आता धीर निघत नाहीए…’’

‘‘प्लीज, आपण लवकर घरी येऊ…पण आता चला ना?’’

‘‘तू तिथे गेलीस की रमशील आपल्याच लोकांमध्ये,’’ विवेकनं मिठी अधिकच घट्ट केली. एक चुंबन घेतलं.

‘‘प्रॉमिस! लवकर घरी येऊ. पण आता चला.’’ विवेकनं किल्ली घेतली अन् जिना उतरू लागला. पटकन् स्वत:चा अवतार ठिकठाक करून ती ही निघाली.

लग्नाच्या हॉलमध्ये विवेक सतत तिच्याजवळ होता. नातलग मैत्रिणी सर्वांनी किती चेष्टा केली तिची. विवेकला तिच्या नटण्यावर एवढ्यासाठीच आक्षेप होता की तिचं सौंदर्य आणखी कुणी बघावं हे त्याला आवडत नव्हतं. आपण होऊन तो कधी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत नसे, पण त्याचा स्वभाव आता तिला कळला होता.

विवेक नसताना तिला किती उदास वाटतं. ते दुसऱ्याला समजणार नव्हतं. दिवसा घरकाम, मुलं, शाळा या सगळ्यात वेळ जायचा. पण रात्री मात्र फार लांबलचक अन् कंटाळवाण्या वाटायच्या. घरात लॅन्डलाइन फोन होता. विवेकचा फोन बरेचदा सासू, सासरे किंवा दिर उचलायचे. रीमाला कधी तरी बोलायला मिळायचं.

त्या दिवशी मात्र फोन तिनंच उचलला. विवेक म्हणाला तो मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घरी पोहोचतोय. त्यानं तिला अर्ध्या दिवसाची सुट्टी घे म्हणूनही बजावलं. मुलांना रिक्शा करून घरी येऊ दे, हेही सांगितलं. ‘‘दुपारी तू मला हवी आहेस.’’ तो म्हणाला.

‘‘अहो पण रात्री घरीच आहात ना?’’

विवेक एकदम रागावला, ‘‘मग मी सुट्टी कॅन्सल करतो?’’

‘‘बरं बर, मी घेते सुट्टी…रागावू नका,’’ तिनं हॉलमध्ये नजर फिरवली. सुर्दैवानं तिथं कुणी नव्हतं. एक तर फोन अगदी भर चौकात असावा अश्या जागी अन् यांना रोमान्स सुचतोय…

तिनं घरात सकाळीच सांगितलं लंच टाइमपर्यंत विवेक येतोय. शाळेत मंथली टेस्ट चालू होत्या. शाळेत प्रिसिंपलच्या परवानगीनं कॉम्प्युटरचे पेपर्स सकाळीच आटोपून घेतले. घरी एक समारंभ आहे म्हणून हाफ डे घेतेय सांगून वेळ मारू नेली.

ती शाळेच्या गेटपाशी पोहोचतेय तोवर छोटू मोटरसायकल घेऊन समोर आला.

‘‘वहिनी, घरी जायचंय?’’

‘‘चला, मी सोडतो.’’

खरं तर रिक्शा मिळाली असती तर बरं झालं असतं. पण रिक्शा लवकर मिळेलच याची खात्री नाही. उशीर झाला तर पुन्हा विवेक चिडेल.

‘‘कसला विचार करताय वहिनी? आज लवकर कशा काय निघालात?’’

‘‘जरा बरं वाटत नाहीए…’’

‘‘वहिनी, थोडं स्वत:कडेही लक्ष द्या. तुम्ही ना, फारच भोळ्या आहात. दादा तिकडे मजा करतोय अन् तुम्ही मात्र इथं सतत खपताय.’’

‘‘कसली मजा अन् कसलं काय? एकटे राहतात, घरचं जेवण नाही, सतत प्रवास. हे सगळं ते आमच्यासाठीच करताहेत. मुलांच्या भवितव्यालाठीच सगळं चाललंय.’’

‘‘या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. तिथं तर नाइट क्लब, दारू, पोरी सगळंच असतं. कोण बायकोची आठवण काढतंय?’’

तिला वाटलं सांगावं छोटूला की विवेक आताही घरी तिची वाट बघत तळमळतोय. पण ती काही बोलली नाही. घरापाशी मोटर सायकलवरून उतरल्यावर कोरडेपणानंच म्हणाली, ‘‘चहा घेऊन जा.’’

‘‘नको…तुम्हाला बरं नाहीए. पण नंतर येतो. जरा काही कॉम्प्युटरबद्दल विचारायचं आहे.’’

‘‘बराय, पुढल्या पंधरवड्यात ये. आता मुलांच्या टेस्ट चालू आहेत.’’

‘‘तुमची आज्ञा शिरसावंद्य स्वीट वहिनी.’’ झटक्यात बाइक वळवून तो निघून गेला अन् रीमानं सुटकेचा नि:श्वास सोडला.

सासूसासरे व्हरांड्यातच बसलेले होते. ‘‘आज लवकर कशी आलीस? विवेक आलाय म्हणून का? त्याचं जेवणखाणं झालंय..तू काळजी कशाला करतेस?’’ सासूनं म्हटलं.

काही न बोलता खाली मान घालून ती खोलीकडे निघाली. ‘‘अगं तो झोपला असेल, तू आमच्यासाठी चहा कर बरं!’’ सासरे म्हणाले.

खोलीत विवेक उतावीळपणे तिची वाट बघत होता. त्यानं जणू झडपच घातली तिच्यावर. ‘‘किती दिवस झाले तुला भेटून.’’

‘‘फक्त एकच महिना.’’ तिनं हसून म्हटलं. त्याच्या प्रेमवर्षावात ती चिंब भिजली. विवेकनं तृप्त चेहऱ्यानं तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘मी आता झोपणार आहे. तू काय करणार आहेस?’’

‘‘मला आधी जरा तोंड हातपाय धुवून कपडे बदलून घेऊ देत. सासूबाईंना चहा हवा होता. मुलंही येतच असतील. अजून जेवण व्हायचंय माझं…तुम्हाला काय? झोपा आता मुकाट्यानं.’’ तिनं त्याचे केस विस्कटून टाकत हसून म्हटलं.

त्या दिवशी सासूसासऱ्यांशी, दोघी जावांशी अगदी मुलांशीही तिला खोटं बोलावं लागलं होतं.

विवेक रजा संपवून निघून गेला होता. तिनं कपाट आवरायला घेतलं होतं. सुट्टीचा दिवस होता. पुस्तक काखोटीला मारून छोटूनं घरात प्रवेश केला. सरळ तो तिच्या बेडरूममध्येच आला. ती दचकली. सावरून म्हणाली, ‘‘चल बाहेर, व्हरांड्यातच बसूयात.’’

‘‘चालेल ना.’’ पलंगावर बसत तो म्हणाला, ‘‘तुमचा बेड खूपच छान आहे हं! पण एकटीला तुम्हाला यावर झोप येत नसेल ना?’’

काही उत्तर न देता रीमा खोलीबाहेर पडली. मागोमाग छोटूही आला.

‘‘वहिनी, मी मस्करी करत होतो. तुम्ही तर रागावलात.’’

रीमाला जाणवत होतं, विवेक इथं नसताना छोटूची मस्करी मर्यादा ओलांडते. ती जितकी त्याला टाळायला बघते तेवढी त्याच्याकडून मदत घ्यावी लागते. मध्ये ऋचा पायऱ्यांवरून पडली. भरपूर रक्त आलं. छोटूंनच ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन जखमेला टाके घातले. पुढेही दोन दिवस फॉलोअपसाठी त्याच्याच गाडीतून तो रीमाला व तिला नेत होता.

खेळताना मुलाचा पाय मुरगळला. छोटूचीच मदत होती. सासूबाईंचं ब्लडप्रेशर शूट झालं. छोटूनं धावपळ केली. त्याचे उपकार घेतले म्हणताना तिला त्याला तोडूनही टाकता येत नव्हतं.

एक दिवस आला अन् म्हणाला, ‘‘मी हल्ली विमा एजंट झालोय. एक पॉलिसी तर तुम्हाला घ्यावीच लागेल.’’

रीमानं ऋचाच्या नावानं एक पॉलिसी घेतली. कारण घेतली नसती तर तो घरातून हलणार नाही हे तिला ठाऊक होतं.

‘‘याला म्हणतात समजूतदारपणा. यू आर रीयली स्वीट वहिनी.’’ छोटूनं म्हटलं.

‘‘दादा कधी येणार आहेत?’’

‘‘तुला का आठवण येतेय त्यांची?’’ रीमानं रागानं विचारलं.

‘‘तुमचा एकटेपणा बघवत नाहीए मला. हे इतकं तरूण वय काय असं एकट्यानं झुरण्याचं वय आहे का?’’

‘‘असतात काही काळासाठी तसे योग.’’

‘‘पण तुम्ही असं विरक्त का राहायंच…छान मौजमजा करायची.’’

‘‘म्हणजे काय?’’ तिनं मुद्दामच विचारलं.

‘‘वहिनी, तुमच्याकडे तर डबल लायसेन्स आहे.’’

छोटू मर्यादा ओलांडतो आहे हे लक्षात आलंच होतं. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकावा म्हणून तिनं विचारलं, ‘‘मौजमजा करायला लायसेन्स लागतं?’’

‘‘म्हणजे एक तर तुम्ही विवाहित आहात, त्यातून तुमचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशनही झालंय. आता तर मुक्त पक्ष्यांप्रमाणे आकाशात भरारी घ्यायची.’’

‘‘म्हणजे काय? मला काहीच कळलं नाही.’’

‘‘वहिनी, अगं तुझा हा भाबडेपणाचं मला वेड लावतो. अगं, दादा दिल्लीला दुसऱ्या कुणा स्त्रीबरोबर मजा करतो. तसं तूही इथे कुणा दुसऱ्याबरोबर मजा करायची.’’

इतका संताप आला रीमाला, पण तसं न दाखवता तिनं म्हटलं, ‘‘हा तर माझ्या पतीचा विश्वासघात ठरेल.’’

‘‘नाही, अजिबात नाही. हा तर फक्त थोडासा टाइमपास असतो. समजायचं एक सिनेमा बघितला. सिनेमा संपला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी.’’

‘‘अजून लग्न झालं नाहीए तुझं, म्हणूनच तुला या नात्याचं पावित्र्य, त्याच्या मर्यादा, त्याचं महत्त्व कळत नाहीए. तुझं लग्न होऊ दे. मग मी सांगेन तुला की एक सिनेमा तुझ्या बायकोचा विवेकनाही दाखव, मग कसं वाटेल तुला.’’

‘‘मला काही वाटणार नाही. मी संकुचित विचारांचा नाही. मोकळ्या विचारांचा आहे. माझी बायको काय करते यानं मला फरक पडणार नाही.’’ छोटू वरवर बेपर्वाइनं बोलला पण त्याचा चेहरा पडला होता.

रीमानं जणू त्याला आव्हानच दिलं. ‘‘ठिक आहे, तू आपल्या बायकोला खरोखर एवढं स्वातंत्र्य देतोस का? ते मी ही बघेनच! मग कळेल की बोलतो तो खरंच करतो का की फुकटचीच वटवट असते.’’

वर्षभरातच विवेकबरोबर ती कानपूरला गेली. बिऱ्हाड मांडलं. खूप आनंदात होती रीमा, एक दिवस अचानक छोटूचा फोन आला.

‘‘बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची? कसा काय फोन केलास?’’ आश्चर्यानं रीमानं विचारलं.

‘‘काय वहिनी, माझ्या लग्नाला आला नाहीत तुम्ही?’’ जरा नाराजीनं त्यानं म्हटलं.

‘‘तू आम्हाला पत्रिकाच पाठवली नाहीस. तिथल्या घरी दिली असशील. त्यांनी तर लग्न झाल्यावरच आम्हाला कळवलं…असू दे, काही हरकत नाही. तुला अन् तुझ्या वधूला खूप खूप शुभेच्छा…’’

‘‘वहिनी, एक काम होतं, म्हणून फोन केला. माझ्या बायकोला बी.एडसाठी कानपूरच्या कॉलेजात एडमिशन मिळालं आहे. तिला राहाण्यासाठी एखादी जागा बघाल का?’’

‘‘अरे व्वा! ही तर आनंदाची बातमी आहे. घराची काळजी करू नकोस. इथं आमचा थ्री बेडरूम फ्लॅट आहे. दोन आम्ही वापरतो. एक तर बंदच असतो. तुम्ही तिथं राहू शकता. काहीच त्रास होणार नाही. तू तर म्हणालाच होतास ना की तुझी बायको फिल्मपण दाखवेल, तर दादाही इथं आहेत. ते तिची काळजी घेतील. तू येच बायकोला घेऊन.’’

खाट्कन फोन बंद झाला. याचा अर्थ छोटूची बायको त्यांच्याकडे येणार नाही.

रीमाला हसायला आलं. ती तर चेष्टा करत होती अन् छोटू घाबरला होता.

विवेक पाणी पिण्यासाठी आत आला होता. रीमाला हसताना बघून त्यानं विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘काही नाही,…मला एक सांगा, छोटूकडून घेतलेल्या पॉलिसीची मुदत कधी पूर्ण होतेय?’’

‘‘पुढच्याच वर्षी. दोन लाख मिळतील. लेकीच्या लग्नाची सोय झालीय…पण तू का विचारते आहेस?’’

‘‘सहजच! एक तरी काम चांगलं केलं छोटूनं.’’

‘‘त्यानं वाईट काम काय केलं होतं? मला ही कळू देत.’’ विवेकनं म्हटलं.

‘‘त्यानं वाईट काम केलं असं मी कधी म्हटलं.’’

‘‘तुम्हां बायकांशी वाद कुणी घालायचे? जाऊ दे झालं.’’

‘‘हे मात्र बरोबर बोललात.’’ रीमा हसत म्हणाली.

मनात म्हणाली, ‘‘काट्यानं काटा निघाला.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...