कथा * सुधा कस्तुरे

‘आजी, अगं, तुला ठाऊक आहे का? आईनं लग्न केलंय.’’ माझ्या पंधरा वर्षांच्या नातीनं मला सांगितलं. सकाळच्या प्रहरी तिच्याकडून ही बातमी ऐकून बॉम्ब पडल्यासारखी मी हादरले.

‘‘तुला कसं समजलं? फोन आला होता का?’’

‘‘नाही, फेसबुकवर पोस्ट केलंय,’’ रीनानं म्हटलं.

मी घाईनं तिच्याकडून मोबाइल घेतला. त्या पुरूषाचं प्रोफाइल बघून मी हतबद्ध झाले. तो पाकिस्तानातला होता. मी दोन्ही हातांनी माझं डोकं दाबून धरलं, ‘‘ही मुलगी काय करेल ते थोडंच आहे. का अशी छळतेय ती आम्हाला?’’ मी स्वत:शीच पुटपुटले.

रीनानं लगेचच आपल्या आईला ‘अनफ्रेंड’ केलं. दहावीला आहे. अगदी लहान नाहीए. बरंच काही कळंत तिला.

घरात एकदम शांतता होती. माझे पती घरी नव्हते. थोड्या वेळानं ते घरी आल्यावर त्यांना ही बातमी समजली. तेही हादरलेच! मग थोड्या वेळानं म्हणाले, ‘‘बरं झालं. निदान लग्न करून स्वत:चा संसार मांडावा अन् आम्हाला जबाबदारीतून मुक्त करावं. निदान स्वत:च्या मुलांना सांभाळावं. आता या वयात आम्हाला नातवंडं सांभाळून होत नाहीत…तू शांत हो…काळजी करू नकोस.’’

‘‘काळजी आहेच हो! मुक्ती कुठली मिळतेय? उलट जबाबदारी वाढलीच आहे. ज्याच्याशी लग्न केलंय तो कुणी पाकिस्तानी आहे. आता ती तिथंच राहील. म्हणून तर काही बोलली नव्हती. आता मुलं आपल्यालाच सांभाळावी लागतील. अर्थात् तिनं हे सांगितलं असतं तर आपण परवानगी दिलीच नसती. आपल्या देशात मुलं नाहीएत का? मला म्हणाली होती की ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जाते आहे.’’ मी म्हटलं.

ते चकित होऊन माझ्याकडे बघत राहिले.

‘‘कुणी मुलगी इतकी स्वाथी कशी होऊ शकते जिला म्हाताऱ्या आईबाबांची काळजी नाही…कुणी आई इतकी कठोर कशी होऊ शकते, जिला आपल्या मुलांची माया नाही,’’ मी संतापून बोलत होते.

‘‘खरंच! आपली नाही, निदान तिनं मुलांची तरी काळजी घ्यायला हवी…तिच्या मुलांना खरं तर आपणच वाढवतो आहेत. तिच्याबरोबर एकत्र राहताना घरात कायम ताणतणाव असायचा. आता ती नाहीए म्हणताना आपण निदान निवांत राहू शकू.’’ यांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

‘‘ते ठीक आहे, पण आपण तरी कुठवर सांभाळणार? आणि खर्चाचं काय? मुलांच्या खर्चाला पैसे नकोत का?’’ मी हताशपणे म्हणाले.

‘‘खरंय!’’ त्यांनी म्हटलं.

‘‘बघूया, काय करता येईल…मार्ग तर काढावाच लागेल.’’

आम्हाला मुलगा नाही. एकुलती एक मुलगी मंजिरी. लाडाकोडात वाढवलं तिला. सॉफ्टवेयर इंजिनियर झाली. नोकरीला लागली. पण तिचं सगळंच वागणं खटकणारं होतं. जिवापाड प्रयत्न केले पण तिचे गुण वेगळेच होते. तिचं वागणं आम्हाला पटत नव्हतं. तिला दुसरा मुलगा झाला तेव्हापासून आम्ही तिची पहिली मुलगी अन् या मुलाला सांभाळायला तिच्या बरोबरच राहत होतो.

कित्येकदा तिच्या वागण्यांत, वाईट बोलण्यानं आम्ही दुरावलो जात होतो. मग आता इथं रहायचं नाही असं ठरवून पुन्हा आपल्या घरी येत होतो. पण मग मुलांचे होणारे हाल बघून आम्हाला परत तिथं जावंच लागायचं. आमचा जीव मुलांमध्ये गुंतलेला होता. त्याचा फायदा मंजिरी घ्यायची.

आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न केला की ती आम्हाला ऐकवायची, ‘‘तुम्ही मला वाढवलंत तसं मला माझ्या मुलांना वाढवायचं नाहीए.’’ तिला वाढवताना आमचं काय चुकलं होतं ते आम्हाला अजूनही कळलेलं नाही. निर्लज्जपणा, बेजबाबदारपणा, अती महत्त्वाकांक्षा, त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती हे सगळं तिच्यात कुठून आलं ते ही आम्हाला समजलेलं नाहीए.

खरं तर कष्ट केल्याशिवाय तिला सगळं हवं असतं. ऑफिसातही कामं टाळण्यासाठी चक्कर येणं, जीव घाबरणं अशी नाटकं करून सुट्या घ्यायची. डॉक्टरकडून खोटे रिपोर्ट तयार करून घेऊन आम्हाला घाबरवायची अन् उपचारांचा खर्च आमच्याकडून वसूल करायची.

आम्हाला ती इमोशनली ब्लॅकमेल करायची. सुरूवातीला तिचे रिपोट्स बघून आम्ही घाबरून जात असूं. वाटायचं, हिला काही झालं तर या मुलांचं काय व्हायचं? पण ती अगदी बिनधास्त असायची. नंतर कळलं की ती गुगलवरून अशा आजारांची माहिती मिळवायची नोकरी सोडायची, काही तरी बिझनेस सुरू करायचा, पुन्हा त्यात तोटा झाला की तो बंद करून नोकरी सुरू करायची….तिला तीच सवय लागली होती जणू. घरकामात तर अजिबातच तिचं लक्ष नव्हतं. बाई किंवा हॉटलच्या स्वयंपाकावरच मुलं वाढंत होती.

तिला अमेरिकेचं आकर्षण होतं. तिथलाच नवरा हवा होता. नेटवरून तिनंच अमेरिकेतल्या एका मुलाशी लग्न ठरवलं. तो भारतात आला. आम्ही लग्न करून दिलं. पण त्या मुलाची संपूर्ण माहिती काही तिनं आम्हाला दिली नाही. आम्हाला शोधही घेऊ दिला नाही. लग्न करून ती अमेरिकत निघून गेली अन् दीडच वर्षात पोटात बाळ घेऊन भारतात परत आली ती पुन्हा त्याच्याकडे न जाण्यासाठीच!

अमेरिकेत गेल्यावर तिला कळलं की तो विवाहित आहे. आधीच्या दोन बायकांपासून त्याला मुलंही आहेत. तिनं तिथून पळ काढला. पुन्हा भारतात आली. आम्हाला धक्काच बसला होता. तिचं बाळंतपण निस्तरलं. तान्ह्या मुलीला आमच्याजवळ ठेवून घेतलं. मंजिरीला दिल्लीला नोकरी मिळाली म्हणून ती एकटीच दिल्लीला गेली.

एकदा अवचित आम्ही लहानग्या रीनाला घेऊन दिल्लीला मंजिरीकडे गेलो तर अजून एक धक्का बसला. ती कुणा तरूणाबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती. काय करावं या मुलीला आम्हाला समजत नव्हतं. आम्हाला बघताच तो मुलगा जो पळाला तो आजता-गायत परत आला नाही. मंजिरी तेव्हा चार महिन्यांची गरोदर होती. गर्भपात करण्याची वेळ निघून गेली होती. अगदी नाईलाज म्हणून आम्हाला तिच्याबरोबर दिल्लीला रहावंच लागलं.

मधल्या काळात मंजिरीची एक दोन प्रेमप्रकरणं आणखी झाली. पण आमच्या भाग्यानं तिला त्यातून दिवस गेले नव्हते. ती प्रकरणंही निकाली निघाली…पण आतचा हे लग्न, त्यातून पाकिस्तानी माणसाशी…मंजिरीला अक्कल का येत नाही? किती वेळा चुका कराव्यात माणसानं. आता हा माणूस तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत निभवणार आहे का? त्यातून अजून एखादं मुल झालं तर?

केवळ कल्पनेनंच मला कापरं भरलं. तिचा भूतकाळ बघता माहितीतला कुणी पुरूष तिला स्वीकारेल हे शक्यच नाही. नातलग, समाज आमची कींव करतो. आम्ही चांगले आहोत. मंजिरीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय, हेसुद्धा सगळे जाणून आहेत. पण म्हणून उघड्या डोळ्यांनी कुणी मंजिरीला आपलं म्हणेल हे शक्यच नाही आणि आता जे काही तिनं केलंय त्यानंतर तर तिला भारतात येऊन आपल्या मुलांनाही भेटायला तोंड कुठं आहे? नक्कीच तो कुणी तरी खूप श्रीमंत असामी असणार. पैशासाठी मंजिरीनं त्याला आपल्या जाळ्यात ओढलं असेल. पैशासाठी ती काहीही करू शकते. बघूया, लवकरच काय ते समोर येईल…किती दिवस अशा गोष्टी लपून राहतात?

रीनानं तिला फेसबुकवर अनफ्रेंड केल्यावर मंजिरीला हे तर लक्षात आलं की तिच्या लग्नाची बातमी सर्वांना समजली आहे. महत्त्वांचं म्हणजे तिची लेक तिच्यावर फारच नाराज आहे. मग रोजच मंजिरीचे फोन येऊ लागले, आम्ही ते घेत नव्हतो. पण एकदा मीच विचार केला की निदान तिच्याशी बोलून घ्यायला हवं. मुलांच्या भवितव्याचाही विचार करायलाच हवा ना?

शेवटी एकदा मी फोन उचलला अन् ‘हॅलो’ म्हटलं, ती लगेच बोलायला लागली, ‘‘रीनाला समजव जरा. मला ही माझं आयुष्य आनंदातच जगायचा हक्क आहे म्हणावं. माझ्या लग्नामुळे कुणाला काय त्रास होतोय? आणि मी माझ्या मुलांची जबाबदारी घेते आहे. मी सांभाळीन त्यांना. काहीही कमी पडू देणार नाही. कारण ज्याच्याशी मी लग्न केलंय तो मोठा व्यापारी, व्यवसायी आहे. गडगंज पैसा आहे त्याच्याकडे…’’

एकूण माझा अंदाज बरोबरच होता. पैसा बघून त्याच्याशी माझ्या पोरीनं लग्न केलं होतं. काही दिवस गेले अन् कुरियरनं एक भलं मोठं पार्सल आलं. त्यात महागडे मोबाईल, मुलांसाठी उंची ब्रॅन्डेड कपडे अन् काही खेळणी होती. शिवाय ऑनलाइन खाण्याचे किती तरी पदार्थ केक, पेस्ट्री, चॉकलेट, सुका मेवा वगैरे पाठवलं होतं…आमच्या मुलीनं तिच्या मुलांसाठी. पण धाकट्या चिंटूखेरीज कुणालाच ते बघून आनंद झाला नाही.

पुन्हा एकदा तिचा फोन आला. मुलांचा व्हिसा काढून घ्या. ती मुलांसाठी पाकिस्तानची एयर तिकिटं पाठवते आहे. अन् आमच्यासाठी आमच्या घरी जाण्यासाठी ही विमानाची तिकिटं पाठवते आहे.

रीना संतापून म्हणाली, ‘‘मला नाही जायचंय तिकडे. आय हेट हर…नाती, मी तुझ्याजवळच राहणार आहे.’’

चिंटू म्हणाला, ‘‘मला जायचंय आईकडे…पण ती इथं का येत नाही?’’

मला काहीच बोलणं सुधरेना. शेवटी पुन्हा तिचा फोन आला तेव्हा मी म्हटलं, ‘‘तुझा निरोप मिळालाय. तू मुलांना जन्म दिला आहेस, तेव्हा त्यांच्यावर तुझ्च हक्क आहे. कायदा ही तुझ्याच बाजूनं असणार…आम्ही फक्त केयर-टेकर आहोत. आमचं नातं थोडीच आहे मुलांशी…फक्त त्यांची काळजी घेऊन  वाढवलंय त्यांना. खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्यात जीव गुंतलाय. एकदा ती तिकडं गेली की आम्ही त्यांना बघूही शकणार नाही, की व्याकूळ होऊ आम्ही, याची कल्पना आहे का तुला?’’

‘‘अन् खरंच तुला मुलांची इतकी काळजी असती तर हे पाऊल उचलण्यापूर्वी तू विचार केला असता, अगं,, मुलांना मुळात प्रेम अन् वेळ हवा असतो. ढीगभर पैसा नको असतो. मला कळंतच नाही की तू आमची मुलगी असून अशी कशी निपजलीस? आमच्या भावना तुला समजायच्याच नाहीत…तू मुलांची काळजी घेशील यावर माझा विश्वास नाही…अन् त्या सावत्र बापावर तरी विश्वास कसा ठेवावा आम्ही?

‘‘चिंटूची इच्छा आहे, त्याला पाठवून देते, पण, रीनाला नाही पाठवणार. काळ तसाच वाईट आहे…वयात आलेली पोर…तिला मायेची, संरक्षणाची गरज आहे. मला जमेल तसं मी करेन…पण रीना राहील माझ्याजवळंच.’’

एवढं बोलून मी फोन बंद केला. माझ्या पतींनी अन् रीनानं मला शाबासकी दिली. त्यांना निर्णय पटला होता…रीनानं तर आनंदानं मला मिठीच मारली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...