संशय पिशाच्च

कथा * श्री प्रकाश

सागरची बोट बँकॉकहून मुंबईला जायला अगदी तयार होती. तो इंजिनमध्ये आपल्या शिफ्टवर होता. त्याची बोट मुंबईहून बँकॉक, सिंगापूर, हाँगकाँग वरून टोकियोला जायची. आता परतीच्या प्रवासात तो बँकाकपर्यंत आला होता. तेवढ्यात बोटीच्या ब्रिजवरून (ज्याला कंट्रोलरूम म्हणतात) मेसेज आला, रेडी टू सेल.

सागरनं शक्तिमान एयर कॉम्प्रेसर स्टार्ट केला. वरून पुन्हा आदेश आला डेड स्लो अहेड. त्यानं इंजिनमध्ये कंप्रेस्ड एयर आणि ऑइल घातलं अन् शिप बँकॉक पोर्टवरून निघालं. त्यानंतर ब्रिजवरून येणाऱ्या आदेशाप्रमाणे शिप स्लो किंवा फास्ट चालत होतं. अर्ध्या तासानंतर शिप ‘हाय सी’ मध्ये होतं. त्यावेळी आदेश मिळाला, ‘फुल अहेड.’

आता बोट फुलस्पीडनं पाणी कापत मुंबईच्या दिशेनं जात होती. सागर निवांत होता. आता फक्त तीन हजार नॉटिकल माइल्सचा प्रवास उरला होता. साधारण आठवड्याच्या आतच तो मुंबईला पोहोचला असता. मुंबई सोडून त्याला आता चार महिने झाले होते.

आपली चार तासांची ड्यूटी आटोपून सागर त्याच्या केबिनमध्ये सोफ्यावर विश्रांती घेत होता. मनोरंजनासाठी त्यानं आपल्या लॅपटॉपवर रूस्तम सिनेमाची सीडी लावली. पण पूर्ण सिनेमा त्याला बघून होईना. यापूर्वी एक जुना सिनेमा होता, ‘ये रास्ते हैं प्यार के’ तो त्यानं बघितला होता. त्या जुन्या सिनेमावरूनच हा नवा सिनेमा बेतलेला होता. त्यात एका मर्चंटनेव्हीच्या ऑफिसरची कथा होती…त्याच्या पत्नीच्या बदफैलीपणाची.

त्याच्या मनांतही संशय पिशाच्चानं थैमान मांडलं. त्याच्या गैर हजेरीत त्याची पत्नी शैलजाही असंच काही करत असेल का? त्यानं ताबडतोब तो विचार मनातून झकून टाकला. शैलजा अशी नाही. तिचं सागरवर मनापासून प्रेम आहे. ती तर सतत त्याला फोन करत असते. ‘लवकर ये, मी तुझी वाट बघतेय…मला इथं तुझ्यावाचून करमत नाहीए…सध्या तर सासूबाई पण इथं नाहीएत. त्या गावी गेल्या आहेत.’

सागरचं लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांतच त्याला टोकियोला जावं लागलं. शैलजा मुंबईतच होती. सागरनं एका सुंदर अपार्टमेंटमध्ये सर्व सुखसोयींनी सुसज्ज फ्लॅट घेतला होता. दरवाज्यावर रिंग डोअर बेल, ज्यात कॅमेरा, सेंसर आणि फोनचीही सोय असते लावून घेतला होता. त्यात बाथरूमच्या माध्यमातून वेगवेगळ्या निवडक सेलफोन एप्सशी संपर्क असतो.

डोअरबेल वाजली किंवा दरवाजाजवळ कुठलीही हालचाल जरी झाली तर बाहेरची व्यक्ति सेलफोनवर दिसते. ‘टॉक’ बटन दाबलं की घरातून त्या व्यक्तिशी बोलताही येतं. सागरनं आई व शैलजाच्या फोन व्यतिरिक्त मुंबईतल्या आणखी एका जवळच्या नातलगाच्या फोनशीही डोअरबेल कनेक्ट केली होती. त्याच्या गैरहजेरीत एकट्या राहणाऱ्या शैलजाच्या सुरक्षिततेसाठी तो सर्वतोपरी दक्ष होता.

सागरची पत्नी दिवसा कुठंतरी एक पार्ट टाइम जॉब करायची. बाकी वेळ ती घरातच असायची. सासूबरोबर तिचं छान जमायचं. पण सध्या सासूबाई सांगलीला गेल्या होत्या. त्यामुळे शैलजा एकटी कंटाळली होती. सागरनं मुंबईला पोहोचण्याची अंदाजे वेळ तिला कळवली होती, पण नक्की वेळ तो सांगू शकला नव्हता. तशी फ्लॅटची एक किल्ली त्याच्याजवळ असायचीच.

शिपनं एव्हाना अर्ध अंतर ओलांडून भारतीय समुद्रात प्रवेश केला होता. तीन दिवसांपेक्षाही कमी वेळात सागर मुंबईत पोहोचणार होता. बोट समुद्राच्या लाटांवर हेलकावत होती. सागरचं मनही शैलजाच्या ओढीनं व्याकूळ झालं होतं. तेवढ्यात त्याचा सहकारी दारावर टकटक करून आत आला आणि म्हणाला, ‘‘अरे, ‘रूस्तम’ बघून झाला असेल तर ती सीडी मला दे ना.’’

मित्र कम सहकारी सीडी घेऊन गेला अन् सागरच्या मनात पुन्हा संशयानं ठाण मांडलं. सिनेमात दाखवलेल्या स्त्रीसारखी शैलजाही कुणा दुसऱ्या पुरूषाच्या प्रेमात असेल का? पुन्हा स्वत:च त्यानं मनाला समजावलं, असा संशय घेणं बरोबर नाही. शैलजा तशी नाहीए.

सागरची बोट मुंबई बंदराच्या जवळ होती, पण तिथं जहाज नांगराला जागा नसल्यानं समुद्रात थोड्या अंतरावर नांगर टाकून बोट उभी केली गेली होती. सायंकाळ होऊ घातली होती. त्याचं वायफाय काम करू लागलं होतं. त्याच्या फोनवर मेसेज आला, ‘रिंग एट योर डोर,’ मुंबईत पाऊस सुरू झाला होता.

त्यानं त्याच्या फोनवर बघितलं की जीन्स घातलेली अन् हातात छत्री घेतलेली कुणी व्यक्ति दारात उभी आहे. तेवढ्यात शैलजानं दार उघडून हसून त्या व्यक्तिला आलिंगन दिलं अन् घरात घेतलं. छत्रीमुळे ती व्यक्ति त्याला नीट दिसली नव्हती. सागरला ते विचित्र वाटलं.

थोड्याच वेळात कंपनीच्या लाँचनं तो किनाऱ्यावर पोहोचला. तिथून त्यानं टॅक्सी केली. घरो पोहोचेपर्यंत मध्यरात्र झालेली होती. तो आपल्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला. फ्लॅटपाशी पोहोचल्यावर त्यानं आपल्या जवळच्या लॅचकीनं हलकेच दरवाजा उघडला. आत फ्लोअर लाइटचा मंद उजेड होता.

बेडरूमचा दरवाजा उघडा होता. बेडवर शैलजा नाइटी घालून झोपलेली होती. तिच्या शेजारी अजून कुणी तरी होतं. जीन्स अन् टीशर्ट मधली व्यक्ति त्याला पाठमोरी दिसत होती. त्या व्यक्तिनं उशी डोक्याखाली न घेता तोंडावर घेतली होती. त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. शैलजाचा हात त्या व्यक्तिच्या अंगावर होता. शैलजाचा कुणी प्रियकर आहे का? तो दबक्या पावलांनी खोलीबाहेर आला. फ्लॅट लॉक केला अन् सरळ हॉटेलात जाऊन थांबला.

त्याला झोप लागत नव्हती. केव्हातरी थोडीशी डुलकी लागली. सकाळी त्यानं चहा अन् ब्रेकफास्ट मागवला. अन् शैलजाला फोन केला, ‘‘आत्ताच पोहोचलो मुंबईत. तू कशी आहेस?’’

‘‘मी छान आहे. काल तुमची वाट बघत होते. त्यामुळे दरवाजा आतून लॉक केला नव्हता. पण रात्री बाराच्या सुमाराला झोपले. खूप दमले होते. इतकी गाढ झोप लागली की सकाळी मेडसर्व्हंट आली तेव्हाच जाग आली.’’

‘‘दोन तासात पोहोचतोय.’’

आपली लहानशी स्ट्रोलर बॅग घेऊन तो टॅक्सीनं घरी पोहोचला. त्यानं बेल वाजवली. शैलजानं दार उघडलं अन् त्याला मिठीच मारली. तो सरळ बेडरूममध्येच पोहोचला. ‘‘शैलजा टॉवेल दे. मला अंघोळ करायची आहे.’’

‘‘ही बाथरूम बिझी आहे. गेस्टरूमवाल्या बाथरूममध्ये करता का अंघोळ?’’

‘‘बाथरूममध्ये कुणी आहे का?’’

‘‘हो…’’

‘‘कोण आहे.’’

‘‘बाहेर आल्यावर कळेलच. घाई कशाला?’’

‘‘हॉलमध्येच बसा. मी चहा आणते, मग बोलूयात.’’ शैलानं चहा आणला. दोघांनी चहा घेतला, फारसं संभाषण झालं नाही. ‘‘मी ब्रेकफास्टचं बघते,’’ म्हणून शैला किचनमध्ये गेली.

पाचच मिनिटांत तिनं आतून सांगितलं, ‘‘बाथरूम रिकामी आहे. स्नान आटोपून घ्या.’’

सागर बाथरूममध्ये गेला. काल बघितलेली जीन्स आणि टीशर्ट होता.

त्यानं टबबाथचा विचार बाद केला अन् शॉवर सुरू केला. शैलजानं दारावर टकटक करत म्हटलं, ‘‘किती वेळ लागेल अजून? लवकर डायनिंग टेबलवर या. मस्त गरम गरम नाश्ता तयार आहे.’’

तो कपडे घालून फ्रेश होऊन डायनिंग टेबलपाशी आला. शैलजानं ज्यूसचा ग्लास त्याच्या हातात दिला अन् गरम छोले भरलेला बाऊल टेबलवर ठेवत ती म्हणाली, ‘‘गरमागरम भटुरे आणि कचोरी घेऊन येते.’’

‘‘ते सगळं नंतर. आधी इथं बैस. मला तुझ्याशी बोलायचं आहे.’’

तेवढ्यात किचनमधून कुणीतरी म्हणालं, ‘‘शैलू, तू बैस बाहेरच मी येतेय कचोरी भटुरे घेऊन.’’

पाठोपाठ एक स्त्री गरमगरम कचोरी अन् भटुरें घेऊन किचनमधून बाहेर आली. अन् तिने हातातला ट्रे टेबलवर ठेवला.

सागर आश्चर्यानं तिच्याकडे बघत होता, ‘‘माझ्याकडे बघत बसलात तर हे गरम छोले भटूरे गार होतील,’’ ती हसून म्हणाली.

‘‘सागर, ही नीरू. माझ्या मामेभावाची बायको. ही माझ्याबरोबर कॉलेजला होती, त्यामुळे वहिनी कम मैत्रीण असं नातं आहे आमचं. यांच्या लग्नाला मला जाता आलं नव्हतं. पूर्वी ही गुवाहाटीला होती आता नाशिकला आहे. माझा भाऊ आर्मीत आहे. सध्या तो एका ट्रेनिंगवर गेलाय. म्हणून ही मला भेटायला आलीय.’’

‘‘बाथरूममध्ये जीन्स टी शर्ट कुणाचेय?’’

‘‘माझेच कपडे आहेत. काल सायंकाळी इथं आल्यावर आम्ही दोघी क्लबहाऊसमध्ये गेलो. भरपूर बॅडमिंटन खेळलो. खूप दमलो होतो. मी तर कपडे न बदलताच झोपले,’’ नीरूनं म्हटलं.

‘‘नाही, क्लबमध्ये आधी आम्ही रूस्तम सिनेमाही बघितला. तुला बघायचाय का?’’ शैलजानं विचारलं.

‘‘तुम्ही पण ‘रूस्तम’ बघितलात?’’ आश्चर्यानं सागरनं विचारलं.

‘‘त्यात एवढं आश्चर्य कसलं वाटतंय?’’ नीरूनं म्हटलं.

‘‘नाही, आश्चर्य नाही. मी पण एवढ्यातच शिपवर बघितला.’’ सागरनं सफाई दिली. त्याच्या मनांतला ‘रूस्तम’, संशय पार निघून गेला होता.

शैलजानं म्हटलं, ‘‘तुम्ही काही सांगणार होता ना?’’

आता विचारण्यासारखं काहीच नव्हतं. सागरनं म्हटलं, ‘‘अगं मला सुट्टी फक्त दहा दिवसंच मिळाली आहे. पुन्हा दहा दिवसांनी टोकियोची व्हिजिट आहे.’’

‘‘मी आजच सायंकाळी जाते आहे. दहा दिवस तुम्ही दोघं मनसोक्त मजा करा.’’ नीरूनं म्हटलं.

‘‘आणि जमलं तर मलाही यावेळी बोटीवर घेऊन चल…एकटीला इथं कंटाळा येतो.’’ शैलजानं म्हटलं.

सागरनं फक्त मान डोलावली.

विध्वंस

कथा * राधिका साठे

आता हळूहळू सगळंच पूर्वपदावर येऊ लागलं होतं. गेला आठवडाभर ज्या ऑफिसमधून कामं बंद पडली होती, ती ऑफिसं आता सुरू झाली होती. रस्त्यांवरून सुसाट वेगानं धावणाऱ्या गाड्या रडत-खडत, उखडलेल्या, खचलेल्या रस्त्यांवरून चालू लागल्या होत्या. रस्त्याच्या कडेला हॉकर्सनी पुन्हा आपली दुकानं मांडायला सुरूवात केली होती. रोज मजूरी करून पोट भरणारे मजूर आणि घरकाम करणाऱ्या मोलकरणीही पुन्हा रस्त्यांवर दिसू लागल्या होत्या.

गेल्या आठवड्यात चेन्नईत चक्रीवादळानं केलेला विध्वंस सगळीकडे आपली छाप ठेवून होता. अजूनही अनेक भागांमधलं पाणी ओसरलं नव्हतं. खोलगट भागातल्या वस्त्या अजूनही पाण्याखाली होत्या. एयरपोर्ट अजून सुरू झाला नव्हता. मधल्या काळात रस्त्यांवर कंबरभर पाणी होतं. नेटवर्क बंद होतं. फोन, वीज, जीवनावश्यक वस्तू काही म्हणता काहीच नव्हतं. गाड्यांच्या इंजिनात पाणी भरल्यामुळे लोक गाड्या तिथंच टाकून जीव वाचवून पळाले होते. काही ऑफिसमधून सायंकाळी निघालेले लोक कसेबसे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी पोहोचू शकले होते. कॉलेज, होस्टेल्स आणि युनिव्हसिर्टीत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना लष्कराच्या मदतीनं बाहेर काढलं गेलं.

चेन्नई तसंही समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं शहर आहे. इथं अनेक सरोवरंही आहेत, पण त्याच्यावर अतिक्रमणं करून रस्ते आणि बिल्डिंगांची बांधकामं उभी केली गेली. या सात दिवसात त्या सरोवरांनी जणू आक्रोश करून आपला कोंडून घातलेला श्वास मोकळा केला असावा असं सगळं दृष्य दिसत होतं. शहराची पार दुर्दशा झाली होती.

गरीबांच्या वस्त्या झोपडपट्ट्या खोलगट भागात असल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच वाईट होती. कुठंतरी कशीबशी रात्र काढल्यावर सकाळी उपाशी पोराबाळांचा अन्नासाठी अक्रोश सुरू झाल्यावर त्यांनी समोर दिसलेल्या दुकानावर हल्लाच चढवला. भूक माणसाला चोर आणि आक्रमक बनवते.

रात्रीचे अकरा वाजले होते. जिथं जागा मिळेल तिथं लोक जीव वाचवण्यासाठी उभे होते. पाऊस कोसळत होता अन् सगळीकडे पाणी तुंबायला सुरूवात झाली होती. ऑफिसातून पायी चालत निघालेली रिया पाऊस पाण्यात अडकली होती. एका स्टोअर्सच्या पार्किंगला ती कशीबशी उभी होती. अजून काही लोक तिथं होते. तेवढ्यात दारू प्यायलेले काही तरूण तिथं आले. तरूण मुलगी बघून ते काही बाही बरळायला लागले. इथं आपण सुरक्षित नाही हे रियाला कळलं. पण तिथून अजून कुठं निघून जाणं तिला शक्यही नव्हतं. तिथं असलेली इतर माणसंही हे सगळं कळून काहीच न कळल्याचा आव आणून उभी होती. कारण दारू ढोसलेल्या गुंडांशी लढणं त्यांना शक्य नव्हतं. कोसळणारा पाऊस, उसळणारा समुद्र आणि समोर हे मानवी देहाचे लांडगे…रिया फार घाबरली होती.

आता त्या मुलांपैकी एक तर रियाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. रियानं स्वत:ला अधिकच आक्रसून घेतलं. ती आकाशच्या जवळ सरकली.

गर्दीत उभ्या असलेल्या आकाशला रियाची कुचंबणा कळली. तो त्या मवाल्यांना म्हणाला, ‘‘भाऊ, का त्रास देताय तुम्ही यांना. आपणच या परिस्थितीमुळे त्रस्त आहोत…आणि तुम्ही एका असहाय मुलीला त्रास का देत आहात?’’

एवढं बोलायचा अवकाश…त्या पोरांची टाळकी सटकलीच! एक जण बोलला, ‘‘तू कोण लागतोस रे हिचा?  आणि कोण आहे तुझी? फार काळजी घेतो आहेस तिची?’’ मग त्यानं चक्क तिला हातच लावला, वर निर्लज्जपणे म्हणाला, ‘‘हात लावल्यानं झिजणार आहे का ती? बोल, काय करशील? अजून हात लावेन…मिठीत घेईन…बघूया काय करतोस ते?’’

इतके लोक होते तिथं, पण जिवाच्या भीतिनं कुणी एक समोर येईना. सगळे गुपचुप उभे होते. मनातून सगळेच घाबरलेले होते.

रिया खूपच घाबरली. ती थरथर कापत होती. आकाशच्या मागे दडून उभी राहिली. तोच तिचा एकमेव आधार होता.  आता तर त्या बेवड्यांना ऊतच आला. ते आणखी चेकाळले.

घाबरलेल्या रियाला धीर देत आकाशनं म्हटलं, ‘‘तुम्ही घाबरू नका. मी आहे तोवर तुम्ही सुरक्षित आहात.’’

रियाला रडू फुटलं, त्यातल्या एकानं आता आकाशवर हल्ला चढवला. आकाश पूर्ण शक्तिनिशी त्याचा प्रतिकार करू लागला.

तेवढ्यात गर्दीतले काही लोक आकाशच्या मदतीला धावले. काहींनी रियाभोवती कडं करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आकाशला मदत मिळाल्यामुळे आता त्या दारूड्यांना ही लढाई जड जात होती. त्याच्यामुळे आज त्यांची शिकार हातातून निसटल्याचा संताप आता त्यांना अनावर झाला होता.

ते अर्वाच्च शिव्या देत होते. तेवढ्यात एकानं सुरा काढला अन् आकाशच्या छातीवर सपासप वार केले. तेवढ्यात लष्कराचे जवान तिथं पोहोचले अन् त्या गुंडांनी पोबारा केला. सुरीहल्ला बघून गर्दीतले लोक अवाक्च झाले. जवानांनी ताबडतोब नावेत घालून आकाशला इस्पितळात हलवलं. पण फार जास्त रक्त वाहून गेल्यामुळे आकाशची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आकाश मुळचा मुंबईचा. त्याचं कुटुंब मुंबईतच होतं. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. मुंबईच्या ऑफिसनं सहा महिन्यांसाठी त्याला चेन्नईला पाठवलं होतं. मी ही त्याच कंपनीत काम करत असल्यामुळे आमची ओळख होती. कंपनीत बातमी आली अन् आम्ही सगळेच प्रथम अवाक् झालो. खूप हळहळ वाटली. कंपनीतल्या आणखी एका सहकाऱ्यासोबत मी मुंबईला त्याच्या घरी भेटायला गेले. कुठल्या तोंडानं अन् कोणत्या शब्दांत मी त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करणार होते.

मुंबईला आकाशच्या घरात हाहाकार उडाला होता. मुलं केविळवाणी कोपऱ्यात रडत बसली होती अन् त्याची तरूण बायको तर पार उध्वस्त झाली होती. तिची स्थिती बघवत नव्हती. मी मनातल्या मनात विचार करत होते, चांगल्या कामाचं खरं तर बक्षीस मिळतं मग आकाशला ते का मिळालं नाही? त्याला व त्याच्या कुटुंबाला कुठल्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा मिळाली? एका असहाय मुलीला गुंडापासून वाचवण्याचं हे बक्षिस? अखेरीस का?

दगडालाही पाझर फुटेल असा आकांत त्या घरात चालला होता. त्याच्या पत्नीच्या अश्रूंमध्ये सगळं शहर वाहून जाईल असं वाटत होतं. चेन्नईतलं लोकजीवन आता हळूहळू मार्गावर येत होतं. पण मुंबईतल्या आकाशच्या घराची परिस्थिती कधी अन् कशी बदलणार होती? चेन्नईतल्या गुदमरलेल्या सरोवरांनी आपला हक्क हाहाकार माजवून मिळवला होता. पण आकाशची बायको कुणाजवळ हक्क मागणार? तिच्या झालेल्या नुकसानांची भरपाई कोण, कशी करणार? पत्नीला तिचा पती आणि मुलांना त्यांचा पिता परत मिळू शकेल का?

गुंतता हृदय हे

कथा * रेखा नाबर

चल उतर लवकर स्टेशन आलं.’’

‘‘मानसी, स्टेशन आलय. पण चर्नीरोड, चर्चगेट यायला अजून दोन स्टेशन्स आहेत झोपली होतीस का?’’

‘‘चांगली जागी आहे मी. चर्नीरोडलाच उतरायचय. चल लवकर.’’

मानसीने सुरभीला खाली उतरण्यास भाग पाडले. एरवी बडबड करणारी मानसी आज दादरला चढल्यापासून डोळे मिटून गप्प बसली होती.

‘‘मानसी, बरं वाटत नाहीए का? आज अगदी गुमसुम आहेस.’’

‘‘तेच सांगायचंय तुला. चल, समोरच्या हॉटेलात बसू या.’’

‘‘काय बिघडलं असेल हिचं? सुरभीच्या मनात तर्क विर्तकाची चक्रे फिरू लागली.’’

‘‘सुरभी, आईबाबांनी माझं लग्न ठरवलंय.’’

‘‘काय? तुला न विचारताच?’’

‘‘बाबांनी म्हणे त्यांच्या मित्राला श्यामकाकांना वचन दिलं होतं, त्यांच्या महेशशी माझं लग्न होईल असं.’’

‘‘इतकी वर्षं कधी उल्लेख केला नाही तो!’’

‘‘बोलू नये, पण बोलतेच. संसाराचा गाडा ओढायला माझा पगार हवा होता ना?’’

खरेच होते ते. तिच्या बाबांचा तुटपुंजा पगार. घर चालवायला अपुरा पडत होता. मानसी शिकवण्यासुद्धा करीत असे. ती बी.ए. झाली. तिला एम्. ए. करायचे होते.

‘‘मानु, एका डिग्रीपर्यंत शिक्षण पुरे झालं. आता नोकरी शोधायला लाग. माधवचं शिक्षण व्हायचंय. त्याला इंजीनिअरींग करायचं आहे. माझ्या एकटच्या मिळकतीत ते शक्य नाही.’’

नशिबाने तिला लवकरच नोकरी मिळाली. नोकरी करताना तिने एम्.ए. (अर्थशास्त्र) केले. तिला बढती मिळाली. तरीही तिच्या लग्नाचा विचार वडिलांच्या मनाला शिवला नाही. ऑफिसांतील रमेश दिघेबरोबर तिचे सुर जुळले होते. कितीतरी दिवस त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. ‘मेड फॉर इच अदर’ जोडी होती. त्या अवधीत तिने दुसऱ्यांदा एम्.ए. (राज्यशास्त्र) केले. ती ऑफिसर झाली व आता वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला कारण माधवचं इंजीनिअरींगचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. सुरभी तिची अगदी सख्खी मैत्रिण असल्यामुळे तिला मानसीच्या जीवनपथाची समग्र माहिती होती.

‘‘मानसी, रमेशचा विचार केलायस का? तू सांगितलंस का आईबाबांना?’’

‘‘ते काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत. मला शपथ घातली त्यांनी, शिवाय धमकीसुद्धा दिली की महेशशिवाय दुसऱ्या कोणाशीही मी लग्न केलं तर ते जीव देतील.’’

तसा महेश सर्वच बाबतीत रमेशपेक्षा उजवा होता. पण प्रेमात गुंतलेले मन कधी असला विचार करत नाही.

‘‘मग आता तू काय ठरवलंस?’’

‘‘महेशशी लग्न करण्याखेरीज काही पर्याय ठेवलाच नाहीए आईबाबांनी नाहीतर आत्महत्त्या.’’

‘‘खुळी की काय तू? जीव कस्पटासमान आहे का फेकून द्यायला?’’

‘‘पण रमेशचं वाईट वाटतं गं.’’

‘‘हो ना. त्याला हे सांगायला हवं. जीवावर येतंय अगदी. सुरभी तू सांगशील का गं प्लीज?’’

‘‘छे छे ही तुमच्यातली वैयक्तिक बाब आहे. मी कशी लुडबूड करणार त्यात?’’

‘‘पण तू आम्हा दोघांची जवळची मैत्रीण आहेस ना?’’

मी माझ्या नकारावर ठाम नाही राहू शकले. शेवटी मलाच ते काम करावे लागले. डोके दुखत होते म्हणून कँटीनमध्ये कॉफी प्यायला चालले होते. रमेश कँटीनमधून बाहेर येताना दिसला. परतण्याचा विचार करीत होते.

‘‘सुरभी, बरं झालं भेटलीस. चल, मी परत येतो कँटीनमध्ये. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय.’’

‘‘रमेश, मी घाईत आहे रे. खूपच डोकं दुखत होतं. म्हणून क्रोसिन घेतली. वर गरम कॉफी घेते म्हणजे बरं वाटेल.’’

‘‘मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.’’

या धर्मसंकटातून सुटका नसल्याची सुरभीची खात्री पटली.

‘‘कोणता प्रश्न पडलाय तुला?’’

वेड पांघरून पेडगावला गेले.

‘‘सुरभी, हल्ली मानसीला काय झालंय? फोन केला तर कट करते आणि माझ्या वाऱ्यालासुद्धा उभी राहत नाही. माझं काही चुकलंय का?’’

तो इतका काकुळतीला येऊन बोलत होता की तिला सांगणे भाग पडले, ‘‘हे बघ रमेश, तू सुरभीविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलंय.’’

रमेश जवळजवळ किंचाळलाच.

‘‘ठरवलंसुद्धा? हिला न विचारता? कसं शक्य आहे?’’

‘‘तसंच आहे. तिच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं.’’

‘‘ते वचन मानसीने का पाळायचं? मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे. आमच्या घरातले तिला आनंदाने स्विकारतील.’’

सुशिक्षित, सुंदर, सुस्वभावी मानसी कोणालाही आवडेल अशीच होती.

‘‘ते सगळं खरं असलं, तरी तिच्या आईवडिलांनी तिला शपथ घातली आहे. ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं नाहीस तर जीव देऊ अशी धमकीसुद्धा दिलीय, हे सगळं सांगायचा धीरच होत नाहीए तिचा. नाईलाज आहे रे.’’

‘‘मग काय बोलणंच खुटलं,’’ असे म्हणून लांब उसासा सोडून, निराश मनाने तो निघून गेला. मानसीला सांगितल्यावर ती रडरड रडली. पुढच्याच आठवड्यांत रमेशची अहमदाबादला बदली झाली. म्हणजे त्याने करवूनच घेतली. तो गेल्यावरच आम्हाला ते कळले.

‘‘सुरभी, माझ्या जगण्यातला रसच संपलाय. रस काढल्यावर उरलेल्या चिपाडासारखं आयुष्य माझं. काय ही माझ्या प्रेमाची परवड? मरत नाही म्हणून जगायचं.’’

‘‘अशी निराश नको होऊस मानसी. तुझ्या जीवनातल्या नवीन पर्वाला आरंभ होतोय. काहीही कारणाने का असेना, तू महेशला जीवनसाथी म्हणून स्विकारलं ना, मग त्याच्याशी प्रामाणिक राहा. रमेशने बदली करून घेतली. ते एका अर्थी बरंच झालं.’’

‘‘मला तर त्याची फसवणूक केल्यासारखं वाटतंय. माहिती नाही मी महेशला साथ देऊ शकेन का?’’

‘‘मानसी, तुला खंबीर झालंच पाहिजे. मनाच्या पाटीवरून भूतकाळ पुसून टाक. मला माहिती आहे. सांगणं सोपं आहे. वागणं कठीण आहे. पण मनाचा निर्धार कर आणि पुढे हो.’’

सतत मनावर बिंबवून तिला लग्नाला तयार केली. ऑफिसमध्ये सर्वांनाच तिच्या व रमेशच्या संबंधांबद्दल माहिती होते. त्यामुळे या विवाहाबाबत तिच्यावरच टपका ठेवला गेला.

‘‘आजकालच्या मुली बिनदिक्कत दुसऱ्याच्या भावनांशी खेळतात.’’

‘‘पैसेवाला मिळाल्यावर कसलं प्रेम आणि कसलं काय?’’

‘‘बरं द्ब्राझालं. रमेशनं बदली करून घेतली. नाहीतर झुरून वाट लागली असती त्याची.’’

वस्तुस्थिती फक्त सुरभीलाच माहिती होती. पण कोणाकोणाचं तोंड बंद करणार म्हणून तिने गप्प राहणंच पसंत कले. लग्नाला ऑफिसातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य हजर होते. एका महिन्याच्या रजेनंतर ती हजर झाली, तेव्हा बरीच फ्रेश वाटत होती. सिल्कची भारी साडी, ठसठशीत मंगळसूत्र, हिरवा चुडा यामुळे तिचं मुळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. सुरभीला राहावलं नाही.

‘‘आज खुशीत दिसतोय एक माणूस. मस्त झाला ना हनिमून?’’

‘‘झाला एवढंच खरं. मला महेशच्या ठिकाणी रमेशच दिसतो गं. मग मी बेचैन होते. त्याला साथ नाही देऊ शकत. अपेक्षाभंग होत असणार त्याचा. पण मी तरी काय करू? एक मात्र खरं. महेश खूप चांगला आहे. माझा मूड सांभाळून वागत होता. माझा शब्द पडू देत नव्हता. त्याला माझा भूतकाळ माहीत असेल का गं? सांगायला अवसरच मिळाला नाही.’’

‘‘खरोखरच चांगला जोडीदार मिळालाय तुला. आता मन लावून संसार कर.’’

‘‘माझ्या प्रेमाच्या थडग्यावर संसाराची इमारत कशी उभी करू? हतबल आहे मी.’’

त्यांच्या घरी जणू लक्ष्मी पाणी भरत होती. महेशसुद्धा हौशी होता. नेहमी मानसी भारी भारी साड्या नेसून येत होती. परफेक्ट मॅचिंग ही तर तिची खासियतच होती. लग्नाला दोन वर्षं झाली, तरी काहीच प्रगती न झाल्यामुळे तिची सासू कुरकुर करू लागली.

‘‘सुरभी, हल्ली आई खूपच चिडचिड करतात. मला मूल न होण्याबद्दल टोचून बोलतात. सारखी व्रतवैकल्य आणि पूजाअर्चा करायला लावतात. महेशलासुद्धा सांगता येत नाही. माझं आयुष्य म्हणजे समस्या आणि दु:खाचा सागरच आहे.’’

‘‘असं नसतं मानसी. आयुष्य हे सुखदुखाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र असतं. पण ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वता एवढे’ असं प्रत्येकालाच वाटतं. मला सांग तुला मुल हवंय ना?’’

‘‘आता लग्न केलंय तर मूल व्हायला हवं. निदान सासूबाईंसाठी.’’

‘‘मग तुम्ही डॉक्टरकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या.’’

ती दोघंही डॉक्टरकडे गेली. रिपोर्ट्सवरून दोघांमध्ये काहीही दोष नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. मानसीचा जीव भांड्यात पडला.

‘‘मानसी, तू महेशच्या सहवासांत सुखी आहेस ना?’’

‘‘आहे, कारण मी त्यांच्यात रमेशला बघते.’’

‘‘तसं करू नको मानसी. रमेश हा तुझा भूतकाळ आहे. तो मागे पडला आहे. पण महेश तुझा वर्तमान आणि भविष्य आहे. तुझं सुख त्याच्यावरच अवलबूंन आहे, हे मनावर बिंबव आणि तू त्याच्याशी समरस हो.’’

‘‘प्रयत्न करीन. पण प्रेम जबरदस्तीने केलं जात नाही ते आपोआप होतं.’’

ऑफिसमधील नवरात्रीच्या कार्यक्रमाला ती सुरेख दिसत होती. हिरवी जरीची साडी, हिरवा मॅचिंग साज, भरघोस गजरे. एकच गोष्ट खटकत होती. तिने अंगभर पदर घेतला होता. एरवी ती एका खांद्यावर पिन करीत असे.

‘‘मानसी, इतका छान साज केला आहेस. काकूबाईसारखा अंगभर पदर कशाला घेतलास? नेहमीसारखा पिन कर ना!’’

‘‘अगं, लो नेकचा ब्लाऊज आहे ना, म्हणून अंगभर पदर.’’

‘‘मानसी, हल्ली सगळ्यांचेच लो नेक ब्लाऊज असतात. तुझी गोरीपान पाठ छान दिसेल, हिरव्या बॅकग्राऊंडवर.’’

‘‘काहीतरी काय? आहे तसंच छान दिसतं.’’

‘‘ते काही नाही, मीच करते,’’ असे म्हणत सुरभी तिचा पदर बाजूला करायला लागली.

‘‘एकदा सांगितलं ना, मला असाच पदर हवाय म्हणून,’’ ती एवढ्या जोरात ओरडली की सुरभी तिच्यापासून लाबंच गेली. नंतर ती धावतच वॉशरूममध्ये गेली. काहीतरी गडबड असल्याचे जाणवून सुरभीसुद्धा तिच्यामागे धावली. ओक्साबोक्शी रडत असलेल्या मानसीने पदर बाजूला केला व सुरभीकडे पाठ केली.

‘‘सुरभी, नीट बघ.’’

‘‘अरे बाप रे, हे कधी झालं?’’

‘‘कधी आलाय माहिती नाही. कालच माझ्या लक्षात आलं. खरं तर आज मी हेअरस्टाइल करणार होते. काल संध्याकाळी ट्राय केली आणि पुढे मागे आरसा ठेवून बघत होते तर या पांढऱ्या डागाने डोळ्यापुढे काळोखी आणली.’’

‘‘महेशला सांगितलं का?’’

‘‘नाही. मी आपणहून सांगणारच नाही, कळेल तेव्हा कळेल.’’

‘‘आपण ताबडतोब डॉक्टरकडे जाऊ या.’’

डॉक्टरांनी औषधे दिली, परंतु बरे होण्याची खात्री दिली नाही. जवळजवळ एका महिन्याने तिने सुरभीला परत चर्नीरोडला गाडीतून खाली खेचले.

‘‘सुरभी, त्याला कळलं गं. त्याने सासूबाईला सांगितलं. दोघांनीही माझ्यावर आग पाखडली.’’

‘‘औषधे घेतेस ते सांगितलं का?’’

‘‘सांगितलं गं. पण त्याना वाटतंय लग्नाआधीपासूनच हे डाग आहेत आणि आम्ही त्यांना फसवलय. त्यांनी मला ताबडतोब घर सोडायला सांगितलंय. घटस्फोट देणार आहे तो. सुरभी, माझ्या नशिबात संसार सुख नाहीच आहे. दोन वेळा डाव अर्ध्यावर सोडलाय. काय करू मी आता? जीव देण्यावाचून पर्यायच नाही. असं विद्रुप घेऊन कशाला जगायचं?’’

ती धाय मोकलून रडू लागली. कॉफीशॉपमधील सगळी त्यांच्याकडे पाहू लागली. सुरभीला काही सुचेना.

‘‘मानसी, कूल डाऊन. शांत हो, सगळे आपल्याकडेच पाहतायत. त्याने घराबाहेर काढलं तर माहेरी राहा. तिथेही राहायचं नसेल तर वर्किंग वुमेन्स होस्टेल्स आहेत की भरपूर. तुझी नोकरी अबाधित आहेच. न जाणो वैद्यकिय उपचारांनी तुला बरंही वाटेल. त्याच दिवशी संध्याकाळी ती माहेरी राहायला गेली.

घटस्फोटाची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली. कुठलीही वाईट गोष्ट लवकर पसरते. या रिवाजानुसार तिच्या शरीरावरील पांढरे डागसुद्धा पसरू लागले.’’

दादावहिनी कुरकुर करू लागले.

‘‘मानु, तुझ्यावर वाईट परिस्थिती आलीय हे खरंय. पण आमच्या पदरी मुलगी आहे. तिच्या भवितव्याचा प्रश्न आहे, तेव्हा तू योग्य दिशेने विचार करावास असं मला वाटतं.’’

ज्या भावाच्या भल्यासाठी तिने आपल्या भवितव्याचा विचार बाजूला सारला होता, त्याच भावाने तिला असहाय्य केले. तिच्या मनाला यातना झाल्या. आधार होता फक्त सुरभीचा. वकिलांकडे, कुटुंबन्यायालयांत खेटा घालताना तिचीच साथ होती. घटस्फोट तर होणारच होता. तोपर्यंत दादाकडे राहायचे व नंतर वर्किंग वुमेन्स होस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तिने हालचालसुद्धा सुरू केली. अखेर निर्णयाचा दिवस आला. महेशला समोर बघून तिला भडभडून आले. तिने सुरभीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. अखेर अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाच.

‘‘सुरभी, मी लगेच होस्टेलवर जाणार आहे.’’

‘‘मानसी, तुझं सामान?’’

‘‘आणलीय ना बॅग. दादावहिनी कुठे आहे. तू येतेस ना बरोबर?’’

दादा वहिनी कोर्टात हजर होती.

‘‘हो तर. आज पूर्ण दिवस मी तुझ्याबरोबर असणार आहे.’’

मानसीला कडक उन्हात थंडांव्याचा भास झाला. तेवढ्यात महेश तिच्याजवळ आला. बॅग तिच्याजवळ ठेवली.

‘‘हे तुझे कपडे आणि दागिने, ऑल द बेस्ट.’’

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सुरभीने समजूत घातली.

‘‘मानसी, शांत हो. आपण परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलंय ना? मग कच नाही खायची.’’

शांतपणे तिने दादाकडची बॅग घेतली व दोघीही बाहेर आल्या. त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. समोर रमेश उभा होता. संमिश्र भावनांचा कल्लोळ मानसीच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ती अवाक् झाली, सुरभीनेच आश्चर्य व्यक्त केले.

‘‘रमेश, तू आणि इथे? कशासाठी आलास?’’

‘‘सुरभी, माझा घटस्फोट वगैरे काही नाही. मी माझ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी आलोय.’’

त्याने लाल गुलाबाचे फूल मानसीच्या हातात दिले, तेव्हा ती भानावर आली.

‘‘मला आजच घटस्फोट मिळणार ते तुला कसं कळलं?’’

‘‘आमच्या सेक्शनचा संतोष जाधव आहे ना, तो तुझा सगळा वृत्तांत मला देत होता. मी कायम त्याच्या संपर्कात होतोच. मला सगळी इथ्थंभूत माहिती आहे.’’

‘‘छुपा रूस्तम निघाला हा संतोष.’’

‘‘पण बरंच झालं ना?’’

‘‘रमेश, हे बघ तू जर दयेपोटी माझा स्विकार करत असशील तर ते मला मान्य नाही. एकटं राहण्याचं मानसिक धैर्य आलंय मला.’’

‘‘मानसी, मी तुद्ब्रझ्या स्वभावावर आणि गुणवत्तेवर प्रेम केलं. शरीरावर नाही. दोघांचंही पहिलं प्रेम आहे हे. मर्मबंधांतल्या ठेवीसारखं जपू या. डागाळलेला चंद्र सर्वांना शीतलता देतोच ना? तशीत तू माझ्या जीवनांत ये आणि चांदण्यांची बरसात कर.’’

‘‘अखेर हरवलेलं गवसलं माझं प्रेम’’ असं म्हणून मानसीने आवेगाने रमेशला मिठी मारली. सुरभीने सावध केले.

‘‘हे फॅमिली कोर्ट आहे. भानावर या. एक मात्र खरं इथे लग्न मोडतातच असं नाही. पुनर्मिलनसुद्धा होऊ शकतं.’’

रमेशनं काव्यातून भावना व्यक्त केल्या.

‘‘प्रेम म्हणजे प्रेम असतं. सर्वांचं सेम नसतं.’’

‘‘अहो कवीराज, बहोत खूब. आता या दोन बॅगा आणि त्याची मालकीण सांभाळा. तुम्ही हाकलून देण्याआधीच निघते. शेवटचा दिस गोड जाहला.’’ खद्खदून हसत तिघेही मार्गस्थ होतात. वातावरणांत धून लहरते.

‘‘हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.’’

घुसमट

कथा * पौर्णिमा अत्रे

पाच महिन्यांची सिया, शुभीची पहिलीच मुलगी. लाडक्या लेकीचे पुन्हा:पुन्हा लाड करून शुभीनं तिला खाली ठेवली. बाळंतपणाच्या दीर्घ रजेनंतर शुभी आज प्रथमच ऑफिसला निघाली होती. लहानग्या, गोंडस सियाला सोडून जावंसं वाटत नव्हतं, पण जायला हवंच होतं. गेले सहा महिने ती घरीच होती.

मयंकनं शुभीकडे बघितलं. ती पुन्हा:पुन्हा सियाला छातीशी कवटांळत होती.

‘‘काय झालं?’’ त्यानं विचारलं.

‘‘सियाला सोडून जावंसं वाटत नाहीए.’’

‘‘हो गं! मी समजू शकतो. पण तू काळजी करू नकोस. आईबाबा आहेत…शिवाय रमाबाई आहेच. सिया अगदी सुरक्षित वातावरणात आनंदात राहील. डोंट वरी…चल, निघायला हवं.’’

दिनेश आणि लता म्हणजे शुभीच्या सासूसासऱ्यांनीही तिला आश्वस्त केलं, ‘‘शुभी, अगदी नि:शंक मनानं जा. आम्ही आहोत ना? सिया मजेत राहील.’’

शुभी केविलवाणं हसली. सिया आजीच्या कडेवरून आईकडे बघत होती. शुभीचे डोळे भरून आले. पण ही वेळ भावनाविवश होण्याची नव्हती. तिनं पटकन पर्स उचलली अन् ती मयंकबरोबर घराबाहेर पडली.

शुभी अन् मयंक नवी मुंबईत राहत होती. तिथून आठ किलोमीटर अंतरावर शुभीचं ऑफिस होतं. मयंकनं तिला बस स्टॉपवर सोडलं अन् तो पुढे निघून गेला. बसमध्ये बसायला जागा नव्हती. उभ्याउभ्याच शुभी विचारात गढून गेली.

एका प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन कंपनीत शुभी एक्सपोर्ट मॅनेजर होती. पगार भरपूर होता. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती घरी, ऑफिसातही सर्वांना हवीशी वाटायची. आत्तापर्यंतचं तिचं आयुष्य खूपच निवांत अन् आनंदात गेलं होतं. पण आज सियाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच ऑफिसात आली होती, त्यामुळे ती जरा उदास होती.

ऑफिसात गेल्यावर शुभीनं सर्वत्र नजर फिरवली. बरेच नवे चेहरे दिसले. जुन्या लोकांनी तिचं अभिनंदन केलं अन् ते आपापल्या कामाला लागले. शुभी ज्या पोस्टवर होती तिथं जबाबदाऱ्या भरपूर होत्या. आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्ट तिच अप्रूव्ह करत होती.

शुभीची बॉस शिल्पी तिच्या कामावर खुश होती. कितीही काम असलं तरी शुभी हसतमुखानं सर्व कामाचा फडशा पाडायची. त्यामुळे शिल्पी आपलीही बरीचशी कामं शुभीवर टाकायची. शुभीनंही ती कामं आनंदाने केली होती.

शिल्पी खूपदा म्हणायची, ‘‘शुभी, तू नसतीस तर इतकं काम मी एकटी करू शकले नसते. तुझ्यावर सगळी कामं सोपवून मी अगदी निश्चिंत होते.’’

शुभीला आपल्या कर्तबगारीचा, योग्यतेचा गर्व वाटायचा. तशी शिल्पी बऱ्यापैकी खडूस अन् खवंट होती. पण अशा बॉसकडून कौतुक ऐकलं की शुभीचाही अहंकार सुखावत असे. आपल्या कामाव्यतिरिक्त इतरही अनेक कामं शुभी आटोपत असे.

ऑफिसात आपल्या सीटवर आल्या आल्याच शुभीला स्वत:त उर्जेचा संचार झाल्याचं जाणवलं. कर्तव्याची भावना मनातून उसळी मारून वर आली. शिल्पीला भेटून औपचारिक बोलणं झाल्यावर ती उत्साहानं कामाला लागली. महिनाभरातच एक नवा प्रॉडक्ट लाँच व्हायचा होता. त्याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी शुभी शिल्पीकडे गेली, तेव्हा अगदी थंडपणे ती म्हणाली, ‘‘शुभी, एक नवी मुलगी आली आहे, तिलाच हे असाइनमेंट दिलंय.’’

‘‘पण का? मी आलेय आता तर मी करते ना?’’

‘‘नको, तू राहू दे. बऱ्याच उशिरापर्यंत थांबावं लागेल…तुला तर आता घरी पोहोचण्याची घाई असणार ना?’’

‘‘नाही नाही, असं काही नाहीए…काम तर मी करणारच ना?’’

‘‘नको, तू राहू दे…’’

मनात खळकन् काही तरी फुटल्यासारखं वाटलं शुभीला. ती तर आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्टसाठी जिवाचं रान करत होती, तर आता का नाही करू शकणार काम? सियासाठी तिला घरी लवकर जावं लागेल हे खरं असलं तरी ती जमवून घेईल सगळं. तिच्या मानसिक समाधानासाठी, मानसिक आनंदासाठीच तर ती नोकरी करतेय ना? काही न बोलता ती परत टेबलपाशी आली, पण मघाचा उत्साह, उर्जा आता लोप पावली होती.

तिनं ऑफिसात सर्वत्र नजर फिरवली. तिला एकदम कपिलची आठवण आली. कपिल कुठाय? सकाळपासून दिसलाही नाहीए. त्याच्या आठवणीनं तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मोकळ्या ढाकळ्या विनोदी स्वभावाचा कपिल सतत तिच्याशी चेष्टा मस्करी करायचा. फ्लर्टिंगच म्हणा ना. शुभीला गंमत वाटायची. ती विवाहित होती. त्यातून गरोदर होती, तरीही कपिल तिच्या मागेपुढे करायचा. कपिल तिला एकदम लंच टाइममध्ये भेटला. आज तिनं आपला डबा घरून आणला नव्हता. कॅन्टीनमध्ये जेवावं असं ठरलं होतं. उद्यापासून डबा आणता येईल. ती कॅन्टीनकडे निघाली. तेवढ्यात तिला कपिल दिसला. तिनं हाक मारली,

‘‘कपिल…’’

‘‘अरेच्चा? तू? कशी आहेस?’’

‘‘छान आहे. सकाळपासून दिसला नाहीस?’’

‘‘हो…फिल्डवर होतो. एवढ्यात येतोय.’’

‘‘आणि कसं काय?’’

‘‘छान आहे. तुझी मुलगी कशी आहे?’’

‘‘मस्त आहे, चल, लंच घेऊयात.’’

‘‘हो तू हो पुढे, मी येतोच,’’ म्हणत कपिल दुसरीकडे निघून गेला.

शुभीला नवलच वाटलं? हा तोच कपिल का? इतका फॉर्मल? असा तर तो कधीच वागत नसे. शुभीनं तिच्या जुन्या सहकाऱ्यांबरोबर जेवण उरकलं, सहज लक्ष गेलं तर कपिल एका नव्या ग्रुपसोबत खिदळत होता. तिनं एक नि:श्वास सोडला. घरी फोन करून सासूला सियाबद्दल विचारलं. सगळं ठीक आहे कळल्यावर ती पुन्हा आपल्या टेबलपाशी येऊन कामाला लागली.

संध्याकाळी सहाला शुभी ऑफिसमधून निघून बस स्टॅन्डवर पोहोचली. एरवी इतक्या लवकर ती कधीच निघत नव्हती. कामंच आटोपत नव्हती. आज कामच कमी होतं. ती विचार करत होती. इतक्या दिवसांनी कामावर आल्यावर ऑफिसात चित्त का लागत नव्हतं. कदाचित सियाला पहिल्यांदाच इतका वेळ सोडून आल्यामुळे असेल का? की ऑफिसात बरेच बदल झालेत. नवी माणसं आली आहेत म्हणून? पूर्वी तिला कपिलचं फ्लर्ट करणं आवडायचं. छान टाइमपास होता तो. तिला वाटत होतं, इतक्या दिवसांनी कपिल भेटेल तेव्हा खूप गप्पा मारेल, बडबड करेल, तिला कामही सुचू देणार नाही. पण आज तर त्यानं शुभीला चक्क टाळलंच. ती रजेवर गेल्यानंतर सुरूवातीला तो आवर्जून फोन करायचा. पुढे पुढे मेसेजना रिप्लायसुद्धा देणं बंद केलं होतं. ती ही बाळात गुंतली. आत्ताच्या नव्या प्रॉडक्टमध्ये तिला इंटरेस्ट होता पण शिल्पीशी वाद कुणी घालायचा.

ती घरी पोहोचली, तेव्हा सियाला सांभाळताना सासू सासऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली होती. शुभीनं सिया म्हणून हाक मारताच सिया आईकडे झेपावली. शुभीनं भराभर हातपाय तोंड धुवून कपडे बदलून सियाला जवळ घेतलं. तिला छातीशी कवटाळून ती आपल्या बेडरूममध्ये येऊन अंथरूणावर पडली. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

सासू खोलीत आली. ‘‘कसा गेला दिवस?’’

‘‘सियानं त्रास नाही ना दिला?’’ शुभीनं विचारलं.

‘‘रडली थोडीशी, पण हळूहळू होईल तिला सवय. तिला, आम्हाला अन् तुलाही, कारण तुझं ऑफिसला जाणंही गरजेचं आहे ना?’’ सासू म्हणाली.

एव्हाना मयंकही आला होता. रमाबाई सायंकाळचा स्वयंपाक आटोपून निघून गेल्या होत्या. रात्रीची जेवणं एकत्रच झाली. सिया सर्व वेळ आईला चिकटूनच होती.

मयंकनं विचारलं, ‘‘शुभी, आज खूप दिवसांनी ऑफिसला गेली होतीस, कसा गेला दिवस?’’

‘‘वातावरण खूपच बदलेलं वाटलं. खूप नवीन लोकही आले आहेत. आज काही माझं चित्त लागेना कामात?’’

‘‘कदाचित तुला सतत सियाची आठवण येत असेल…होईल हळूहळू सवय.’’

त्या नंतरच्या पंधरा वीस दिवसांत ऑफिसचे झालेले एकूण बदल लक्षात आल्यावर शुभीला टेन्शनच आलं. हा प्रकार नवा होता. शिल्पी तशीही चिडचिडी होती. नवरा बंगळुरूला जॉब करत होता. ही मुंबईत एकटीच असायची. पंधरा दिवसांनी एकदा नवरा मुंबईत यायचा. त्यामुळे तिला बंधनं काहीच नव्हती. नेमकी सायंकाळी सहा वाजता तिला मीटिंग घेण्याची हुक्की यायची. अत्यंत महत्त्वाची डिस्कशन्स तिला नेमकी साडेसहाला आठवायची. मग सात वाजता मीटिंग व्हायची.

शुभीला आपलं काम आवडायचं. प्रामाणिकपणे ती काम करायची. जास्तीच्या कामाबद्दलही कधी तिनं तक्रार केली नव्हती. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शुभीनं इथवर पोहोचायला खूप श्रम घेतले होते. सहाच्या सुमाराला शुभीनं तिच्या नव्या सहकारी मैत्रिणीला घरी विचारलं तर ती म्हणाली, ‘‘आता तर मीटिंग आहे ना?’’

शुभी दचकलीच! ‘‘मीटिंग कुणी ठेवलीय? मला तर काहीच ठाऊक नव्हतं.’’

वैतागून हेमानं म्हटलं, ‘‘शिल्पीनं बोलावलीय. तिला स्वत:ला घरी जाण्याची कधीच घाई नसते. पण इतरांना घरदार, मुलं, नवरा, कुटुंब सांभाळायचं असतं हे ती लक्षातच घेत नाही.’’

शुभीला जरा गोंधळल्यासारखं झालं…शेवटी न राहवून ती शिल्पीकडे पोहोचली, ‘‘मॅम, मला माटिंगबद्दल ठाऊकच नव्हतं. काय डिस्कस करायचंय? मी काही तयारी करू?’’

‘‘नको, तू राहू दे. एका नव्या असाइनमेंटवर काम करायचंय.’’

‘‘मग मी थांबू का?’’

‘‘नाही…नको, तू घरी जा.’’ लॅपटॉपवरची नजरही न काढता शिल्पी आपलं काम करत राहिली. शुभीला ती उपेक्षा, तो अपमान खूपच खटकला. त्याच मन:स्थितीत ती घरी आली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिला मनातल्या भावना मोकळ्या कराव्याशा वाटल्या. तिनं म्हटलं, ‘‘मयंक, हल्ली ऑफिसात वातावरण विचित्र आहे. मला तिथं घुसमटायला होतंय. पूर्वी माझ्या खेरीज शिल्पीच्या मीटिंग्ज होत नव्हत्या. आता तिला माझी गरजच नाहीए. मला नवी असाइनमेंटही देत नाहीए.’’

कुणी काहीच बोललं नाही, तेव्हा तिच पुढे म्हणाली, ‘‘पूर्वी जे लोक सतत मागेपुढे करायचे, ते ही आता टाळायला बघतात. मला अजिबात आवडत नाहीए तिथं काम करायला. सियाच्या जन्मानंतर मी ऑफिस जॉइन करून चूक केली असं वाटतंय मला. घुसमट सहन होत नाहीए. जीव गुदमरतोय जणू…’’

मयंकनं तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं अन् तो म्हणाला, ‘‘टेकइट ईझी शुभी, तुला कदाचित फार दिवसांनी गेल्यामुळे असं वाटत असेल…पण नोकरी तर करायचीच आहे ना?’’

‘‘नाही, मला नाही जावंसं वाटत…’’

‘‘असं कसं? जावं तर लागेलंच!’’

आता सासूलाही संभाषणांत भाग घ्यावासा वाटला, ‘‘अगं, पण घरात इतके खर्च आहेत, दोघं कमवता आहात म्हणून सगळं सुरळीत चाललंय. एकट्या मयंकाच्या पगारात असं सगळं होईल का?’’

शुभी गप्प बसली. तिलाही माहीत होतं की तिला मिळणाऱ्या दणदणीत पगारामुळेच त्यांचं स्टॅन्डर्ड इतकं ‘हाय’ आहे. स्वत:च्या पायावर उभं असण्याचा तिलाही अभिमान होताच. पण ऑफिसात खरंच तिला घुसमटायला होतंय. नाहीच जावंस वाटत. तिला वाटतंय सध्या ब्रेक घ्यावा. घरीच सियाबरोबर रहावं…पण ब्रेक घेतल्यामुळेच तर सगळं बदललं आहे. सासूसासरे, मयंक सगळेच आपापल्या परीनं तिला समजवंत होते. काही तिला समजलं, काही तिनं समजून घेतलं नाही…ती स्वत:च्याच मनाची समजूत घालत होती.

काही दिवस अजून गेले. सिया आता नऊ महिन्यांची झाली होती. खूपच शांत अन् खेळकर होती सिया. दिवसभर ती आईशिवाय छान राहायची. संध्याकाळी मात्र आई आल्यावर आईला अजिबात सोडत नसे.

शुभीला आता ऑफिसच्या कामात मजा येत नव्हती. शिल्पी आता तिला अजिबात विचारत नव्हती. नवी जबाबदारी देणं तर दूरची गोष्ट होती. सहा महिन्यांत इतका फरक का पडावा हेच तिला कळत नव्हतं. कुठं काय चुकलं? तिनं बाळंतपणाची रजाच घ्यायला नको होती का? पण तो तर तिचा हक्कच होता. पण तेवढ्यामुळे ऑफिसमधली तिची गरजच संपून जावी?

त्यातून पुन्हा कपिलचं तुसडेपणानं वागणं, त्याच्याकडून होणारी उपेक्षा तिला अधिकच दु:खी करत होती. ती एका बाळाची आई झाल्यामुळे त्याच्या स्वभावात इतका फरक पडावा? कधी तरी भेटला तर इतका औपचारिकपणे बोलायचा, वागायचा, जणू हा तो कपिल नाहीच. पूर्वी त्याचे रोमँटिक डॉयलॉग, फ्लर्टिंग, जोक्स ती एन्जॉय करायची. दिवसा कसा उत्साहानं सळसळत संपायचा. आता मात्र ती उदास कंटाळवाणा दिवस कसाबसा रेटून घरी परतायची.

आपली योग्यता, आपल्या अधिकाराच्या अनुरूप काम ऑफिसात दिलं जात नाही यामुळे ती निराश असायची. टेन्शन यायचं तिला. मनाची घुसमट वाढत होती. घरात कुणीच तिला समजून घेत नव्हतं अन् ऑफिसमध्ये मनाजोगतं काम मिळत नव्हतं.

नेमकं तिच्या मागे काय घडलं होतं ते तिला समजलं नाही. पण ऑफिसात वातावरण बदललं होतं. त्यामुळे ती फार त्रस्त होती. ती घुसमट, तो ताण सहन होईना. डिप्रेशन येईल की काय असं वाटत होतं. शेवटी तिनं सरळ राजीनामा लिहिला अन् शिल्पीकडे पाठवला. तिला नवल वाटलं…कुणीच काही रिएक्शन दिली नाही. ती ऑफिसबाहेर पडली अन् तिनं मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला.

थोड्या दिवसांनी दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न करता येतील. तिच्याजवळ योग्यता आहे. वय अजून गेलेलं नाही. ती मेहनती आहे. दुसरी नोकरी सहज मिळेल. सध्या तरी सियाबरोबर वेळ घालवता येईल. इतकी वर्षं इथं मरेमरेतो काम केलं. रात्र की दिवस बघितला नाही, तिथंच तिला इतकं इग्नोर करताहेत. नकोच ती नोकरी.

खूपच दिवसांनी ती त्या दिवशी आनंदी अन् शांत मन:स्थितीत होती. घरी परतताना तिनं सियासाठी खेळणी अन् फ्रॉक्स विकत घेतले. घरी पोहोचताच सिया तिच्याकडे झेपावली. सियाला जवळ घेतल्यावर तिला अजूनच छान वाटलं. रात्री जेवताना तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मी आज राजीनामा दिला.’’

सगळ्यांना जणू विजेचा शॉक बसला. सगळ्यांनी एकदमच विचारलं, ‘‘का?’’

‘‘मला तिथलं टेंशन सहन होईना. ते वातावरण डिप्रेशन आणणारं होतं. मी दुसरी नोकरी शोधेन. मला तिथं आवडत नव्हतं.’’

मयंक चिडचिडून म्हणाला, ‘‘हा काय मूर्खपणा आहे? तिथं नोकरी करायची, वातावरण आवडत नाही याला काय अर्थ आहे?’’

‘‘नोकरीच करत होते, पण मला माझ्या योग्यतेप्रमाणे काम दिलं जात नाही. काम करण्याचं मानसिक समाधान नाही. त्यामुळे मला तिथं आवडत नव्हतं…’’

‘‘पण आधी दुसरा जॉब बघायचा. मग हा सोडायचा.’’

‘‘मी बघणारच आहे. माझ्याकडे योग्यता आहे, अनुभव आहे, वयही गेलेलं नाहीए.’’

सासू रागातच होती. म्हणाली, ‘‘दुसऱ्या जॉबमध्ये मन रमेल याची काय गॅरेंटी आहे? आणि मन लागत नाही हे काय नोकरी सोडायचं कारण असतं का? आता मयंकच्या एका पगारात कसं भागायचं? इतकी घाई का केलीस तू नोकरी सोडायची? थोडा धीर धरला असता…’’

सासरेही म्हणाले, ‘‘आता कधी नोकरी शोधणार, कधी मिळणार, कधी पगार येणार…इतके खर्च आहेत. एका पगारात काय काय होणार? कठीणच आहे…’’

सियाला मांडीवर घेऊन बसलेली शुभी त्या तिघांकडे आळीपाळीनं बघत होती. तिच्या मनाची घुसमट, तिचा होणारा कोंडमारा कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. तिची व्यथा, वेदना यापेक्षाही तिचा पगार थांबला हे महत्त्वांचं होतं…बिचारी शुभी…तिची घुसमट आता अधिकच वाढली होती.

आजी बदलली आहे

कथा * ऋतुजा सोनटक्के

गेली पंधरा वर्ष आम्ही अमेरिकेत राहतोय. इथल्या नोकरीमुळे आम्ही जणू इथलेच झालो आहोत. तीनचार वर्षांनी एकदा आम्ही आईबाबांना भेटायला भारतात जात असू. मुलंही आता इथंच रूळलीत. अनेकदा मी नवऱ्याला म्हटलं, ‘‘आपण आता कधीच भारतात जाऊन राहणार नाही का?’’ तो म्हणाला ‘‘अशी नोकरी तिथं मिळत नाही अन् तिथली नोकरी आपल्याला आवडत नाही, म्हणजे शेवटी आपल्याला इथंच राहणं आलं,’’ तर आम्ही दोघं आपापल्या नोकऱ्या करतोय.

मला आईवडिल नाहीत. नवऱ्याच्या म्हणजे आकाशच्या आईबाबांना मी आईबाबाच म्हणते. ती दोघं भारतात असतात. माझी एकुलती एक नणंद आशूही मुंबईत असते. तिचा नवरा मर्चंट नेव्हीत असतो. तिच्या दोघी मुलींसह ती आईबाबांच्या फ्लॅटच्या शेजारीच असते. ती त्यांची काळजी घेते. यामुळे आम्हीही निर्धास्त असतो. पण आम्हाला असं वाटतं की आता आईबाबांनी तिथं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे येऊन राहावं.

पण त्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या घराचे बंध तुटत नाहीत. अन् अमेरिकेत आम्हाला आवडणार नाही. तिथं फारसे भारतीय नाहीत, भाषेचा एक मोठा अडसर आहेच. पण आशूताईनं त्यांना समजावलं की अमेरिकेत आता खूप भारतीय राहतात. शिवाय थोडे दिवस राहिलात तर भाषाही समजते, बोलता येते. मग ती दोघं आमच्याकडे यायला तयार झाली. आकाश भारतात गेला, आईबाबांचा फ्लॅट विकायला काढला. नाही म्हटलं तरी तो फ्लॅट विकताना आईबाबांना वाईट वाटलं. तिथल्या एकेका वस्तूवर त्यांचा जीव होता. अत्यंत कष्टानं त्यांनी संसार जमवला होता.

पण त्याचवेळी आयुष्याचे उरलेले दिवस आपण नातवंडांसोबत घालवू ही गोष्ट उमेद देत होती. दोनच महिन्यात सगळं काही मार्गी लावून आशुताईचा निरोप घेऊन आईबाबा आमच्याकडे अमेरिकेत आले. आशुताईलाही फार वाईट वाटत होतं. कारण आता भारतात तिलाही कुणाचा आधार नव्हता. मनातलं सांगायला आईएवढं हक्काचे कोण असतं?

माझी मुलं अक्षय आणि अंशिका यांना भेटून आईबाबा सुखावले. मुलंही आपल्या परीनं त्यांच्याशी जुळवून घेत होती. आईंना मुलांचे इंग्रजी एक्सेंट समजत नसत, पण खाणाखुणा करून त्यांचं संभाषण चालायचं. त्यांना इथं बरं वाटावं म्हणून मी बरीच मराठी, हिंदी पुस्तकं व मासिकं ऑनलाइन मागवून घेत होते. हळूहळू इथल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांनाही जमवून घेता आलं.

एक दिवस मी म्हटलं, ‘‘आई, इथं संध्याकाळी काही भारतीय बायका एकत्र जमतात. आपल्याकडे कसा कट्टा असतो, कट्टयावरच्या गप्पा असतात, तसंच! काही तर तुमच्या वयाच्या अन् मुंबईत राहून आलेल्याही आहेत. आज सायंकाळी आपण तिकडे जाऊ, तुमची ओळख करून देते मी. काही मैत्रीणी मिळाल्या की तुमचीही संध्याकाळ मजेत जाईल.’’

आई कबूल झाल्या. मग मी सायंकाळी त्यांना घेऊन कट्टयावर गेले. रूपा मावशी, विनिता मावशी, कमल मावशी अन् लीला मावशींशी ओळख करून दिली. त्या सर्व आईंच्याच वयाच्या होत्या. त्यांनी आनंदानं, प्रेमानं आईंचं स्वागत केले. रूपा मावशी म्हणाल्या, ‘‘आमच्या या कट्टयावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण रोज भेटूयात. कट्टयावरच्या गप्पांमध्ये, आपल्या वयाच्या आणखी एक सभासद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.’’

त्यानंतर आई रोजच त्या सर्वांसह बागेत जाऊ लागल्या. तिथं त्यांचे दोन तास अगदी मजेत जायचे. आता त्यांना इथं राहणंही आवडू लागलं. बाबांनाही इथं मित्र भेटले होते. त्यांनाही इथं आवडत होतं. सकाळी पायी फिरून येणं, सायंकाळी कट्टा, दुपारी वाचन वामकुक्षी व मला स्वयंपाकात मदत करण्यात आईंचा दिवस भर्रकन् संपायचा. रोज सायंकाळी घरी आल्यावर त्या मला तिथं काय काय गप्पा झाल्या ते सांगायच्या. एक दिवस मात्र त्यांचा मूड जरा नीट नव्हता. वालाच्या शेंगा मोडता म्हणाल्या, ‘‘आज रूपा सांगत होती इथं एक भारतीय जोडपं आहे. त्यातला पुरूष नपुंसक आहे. त्याच्या बायकोचं तिच्या ऑफिसमधल्या कुणाशी तरी सूत आहे म्हणे.’’

‘‘आई, इथं अशा गोष्टी सर्रास घडतात. फार कुणी त्यावर चर्चा करत नाही. मी ओळखते त्या दोघांना…दोघंही सज्जन आहेत.’’ मी म्हटलं.

‘‘डोंबलाचे सज्जन, अगं नवरा असताना बाईनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायचे हे काय सज्जनपणाचं लक्षण म्हणायचं का?’’ आई चिडून बोलल्या.

मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांच्या पिढीला अन् भारतात तर हे सगळं भलतंच, अपवित्र किंवा पाप वाटणार. अर्थात् भारतात लपूनछपून अशा गोष्टी घडत असतातच. उघड झालं तर मात्र कठीण असतं. पण आपल्याकडेही रखेल, देवदासी, अंगवस्त्र बाळगणारे लोक होतेच की! श्रीमंत लोक तर उघड उघड हे करायचे. श्रीमंतांना अनेक गोष्टींची मुभा असते. एरवी लपून छपूनही लोक भानगडी करतात. इथं मात्र (म्हणजे अमेरिकेत) सगळं उघड असतं. लोक मोकळेपणानं अशी नाती स्वीकारतात. पण हे आईंना कुणी समजवायचं? मी गप्प बसले. त्यांच्यासोबत शेंगा मोडू लागले. विषय बदलला अन् वेगळ्याच विषयावर आम्ही बोलू लागलो.

आता आईंनाही बऱ्यापैकी इंग्रजीत बोलता येऊ लागलं. त्यामुळे मुलांशी त्या खूप गप्पा मारायच्या. मुलांनाही त्यांच्याकडून भारतातल्या गमतीजमती ऐकायला आवडायचं. आईची मला घरकामात खूप मदत व्हायची. इथं नोकरचाकर हा प्रकारच नसतो. सगळं स्वत:च करायला लागतं. आईंची घरकामतली मदत मला मोलाची वाटायची.

आता त्या इथं छानच रूळल्या होत्या. दर महिन्याला एकदा सगळ्या मैत्रिणी मिळून रेस्टारंण्टमध्ये जायच्या. एकत्र जमायच्या. तेव्हाही प्रत्येकीनं काहीतरी नवा पदार्थ करून आणायचा. आईंना ही कल्पना आवडली. त्या सुरगण होत्या. त्यांनी केलेला पदार्थ नेहमीच भरपूर प्रशंसा मिळवायचा. आता त्या सलवार सूट वापरायला लागल्या होत्या. नवी पर्स, मॅचिंग चप्पल वगैरेची त्यांना मजा वाटत होती. लिपस्टिकही लावायच्या. कधी कधी पत्ते नाही तर एखादा वेगळाच खेळ असायचा. एकूण त्यांचं छान चाललं होतं.

एकदा मी ऑफिसातून परतले, तेव्हा त्या ही त्यांच्या कट्टयावरून घरी परतल्या होत्या. माझी वाट बघत होत्या. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. मी घरात आले तशी पटकन् दोन कप चहा करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या.

‘‘काय म्हणतोय तुमचा कट्टा?’’

‘‘बाकी सगळं छानच आहे गं, पण काही गोष्टी मात्र फारच विचित्र असतात इथं. आज तर स्पर्म डोनेशनचा विषय होता चर्चेला. जर एखाद्या पुरुषाला शुक्राणू (स्पर्म) पुरेसे किंवा सशक्त नसल्यामुळे मूल होत नसेल तर त्याच्या बायकोच्या गर्भाशयात दुसऱ्या कुणाचे तरी शुक्राणु ठेवून गर्भ तयार करतात किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाच्या दोषामुळे पोटात मूल वाढवता आलं नाही तर ती आपलं मूल भाड्याचं गर्भाशय घेऊन (दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ ठेवून) मूल जन्माला घालू शकते. शी शी काय हा अधर्म? घोर कलियुग गं बाई!!’’

मी शांतपणे म्हटलं, ‘‘पण जर मूल हवं म्हणून अशी मदत घेतली तर त्यात वाईट काय आहे?’’

‘‘पण ज्या मातेच्या गर्भात ते मूल वाढेल, तिचेच गुणधर्म, दोष वगैरे घेऊन बाळ जन्माला येईल ना? मग ते मूल स्वत:चं कसं म्हणायचं?’’

यावेळी वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. मी बोलण्याचा विषय बदलायचा प्रयत्न केला, पण आई अजूनही तणतणत होत्या. ‘‘कसला देश आहे…अन् कसली माणसं आहेत. काही संस्कृती, संस्कार यांना नाहीतच जणू. यापुढची पिढी अजून काय काय करेल, कुणास ठाऊक?’’

माझ्या अमेरिकन झालेल्या मुलांना आजीचं हे वागणं, बोलणं फारच मागासलेलं, बुरसटलेलं वाटत होतं. ‘‘ममा, आजी असं का बोलते? जो तो आपला स्वतंत्र आहे ना आपल्या पद्धतीनं वागायला?’’ लेकीनं मला हळूच म्हटलं.

‘‘हो गं! पण आजी आताच भारतातून आली आहे ना, तिला हे सगळं विचित्र वाटतंय.’’ मी लेकीची समजूत घातली.

बघता बघता तीन वर्षं उलटलीसुद्धा. आईंना एकदा भारतात जाऊन आशाताईंना भेटायची फार इच्छा झाली होती. मुलांनाही सुट्या होत्या. मी त्यांची तिकिटं काढून दिली. बाबांना इथंच त्यांच्या मित्रांचे वाढदिवस असल्यामुळे मुंबईला जायचं नव्हतं. ते इथंच राहणार होते.

आई आणि मुलं आल्यामुळे आशुताईला खूप आनंद झाला. गेली तीन वर्षं ती ही फार एकटी पडली होती. आशुताईनं मुलांसाठी, आईसाठी खूप कार्यक्रम ठरवून ठेवले होते. रोज सगळी मिळून कुठं तरी भटकायला जायची. रोज घरात नवे पदार्थ केले जायचे. मुलांच्या आवडीनिवडी, कोडकौतुक पुरवताना आशुताईला खूप आनंद वाटायचा. निशांत म्हणजे माझे मेव्हुणे, आशुताईचा नवरा शिपवरच असायचा. आपल्या दोन मुलींना तर आशुताईनं एकटीनंच वाढवलं होतं. अर्थात निशांत पूर्ण क्रेडिट आशुताईना द्यायचा.

एकदा रात्री आईंना थोडं बेचैन वाटायला लागलं म्हणून त्या आपल्या खोलीतून बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन लवंडल्या. रात्री माझी व आशुताईची मुलं एकाच बेडरूममध्ये झोपत होती. एक खोली आईंना दिली होती. एक खोली आशुताईची होती. आईंना झोप येत नव्हती.

तेवढ्यात आशुताईच्या खोलीचं दार उघडलं. एक तरूण पुरुष खोलीतून बाहेर पडला. त्याला सोडायला गाऊनमध्येच असलेली आशुताईही खोलीबाहेर पडली. जाता जाता त्यानं आशुताईना पुन्हा मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् बाय करून तो निघून गेला.

आपली आई सोफ्यावर बसली आहे हे आशुताईला ठाऊकच नव्हतं. तो पुरुष निघून गेला अन् आईंनी ड्रॉइंगरूमचा दिवा लावून जोरानं विचारलं, ‘‘कोण आहे हा? तुला असं वागणं शोभतं का? तुझा नवरा इथं नाही, तुझ्या मुली मोठ्या होताहेत…’’

‘‘आई, जाऊ दे…तुला कळायचं नाही,’’ आशुताईनं म्हटलं.

आईचा पारा चढलेलाच होता. ‘‘मला कळायंचं नाही का? तुझी अक्कल शेण खायला गेली आहे, माझी नाही,’’ आईनं ताबडतोब फोन लावून अमेरिकेत माझ्या नवऱ्याला ही बातमी दिली.

क्षणभर तर आकाशही भांबवला. मग म्हणाला, ‘‘आई, तू आशुताईला काही बोलू नकोस, मला आधी सगळं प्रकरण समजून घेऊ दे.’’

‘‘तुम्ही ताबडतोब इथं या. मी काय म्हणते ते कळेल तुम्हाला.’’ आईंनी रागानं फोन आपटला.

दुसऱ्याचदिवशीची तिकिटं मिळवून आम्ही दोघं भारतात आलो. आम्हाला बघून आशुताई खूपच घाबरली. त्या दिवशी आम्ही काहीच बोललो नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्यापाशी हा विषय काढला. ती जे सांगत होती ते फार विचित्र होतं. ती सांगत होती,

‘‘दादा, तुला ठाऊक आहे. आमचं लग्नं आम्हा दोघांनाही न विचारता ठरवलं गेलं. मर्चंट नेव्हीच्या नोकरीमुळे निशांत सहा महिने बोटीवर असतो. त्या काळात त्याचे अनेक मुलींशी संबंध येतात. इथं तो येतो तेव्हाही त्याला माझ्यात फारसा इंटरेस्ट नसतो. तो घरातला कर्ता पुरुष म्हणून कर्तव्य पार पाडतो. आमच्या दोन मुलींसाठी खरं तर आम्ही एकत्र आहोत. हा फ्लॅट मला घेऊन दिलाय. घर खर्चाला भरपूर पैसाही देतो. मुलींना काही कमी पडू देत नाही, पण आमच्यात पतिपत्नी म्हणून तसा संबंध नाही.

मी त्याला या बाबतीत विचारलं तर तो म्हणतो तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तुला हवं तर तू घटस्फोट घे. इतर कुणाशी संबंध ठेवायचे तर ठेव. फक्त बाहेर या गोष्टीची चर्चा व्हायला नको. बाहेरच्या जगात आम्ही पतिपत्नी आहोत. पण तशी मी एकटी आहे. मुलींना सोडून कुठं जाऊ? डिव्होर्स घेतला तर मुलींच्या लग्नात अडचण येऊ शकते. पण मलाही प्रेम हवंय. शरीराची ओढ काय फक्त पुरुषालाच असते? स्त्रीला शरीरसुख नको असतं?’’

आशुताई एवढं बोलतेय तोवर आईंनी तिच्या थोबाडीत मारलं. ‘‘लाज नाही वाटत असं बोलायला,’’ त्या ओरडल्या.

आकाशनं आईचा हात धरून तिला बाजूला घेतलं. ‘‘आई, शांत हो, मला आशुशी एकट्याला बोलू दे,’’ आकाश शांतपणे म्हणाला. त्यानं आईला तिच्या खोलीत नेलं.

आता आशुच्या खोलीत आम्ही तिघंच होतो. आशु सांगत होती, ‘‘इथं ही आकाशचे दोन तीन मुलींशी संबंध आहेत. त्यातली एक तर विवाहित आहे. तिच्या नवऱ्यालाही हे माहीत आहे. काल माझ्याकडे आलेला तरूण डायव्होर्सी आहे. एकटाच राहतो. आम्ही दोघं एकटेपणातून एकमेकांच्या जवळ आलो. निशांतला हे ठाऊक आहे. त्याला याबद्दल ऑब्जेक्शन नाही. फक्त हे सगळं चोरून घडतं. बाहेर कुणालाही काहीही ठाऊक नाही. तसं मुंबईतही कुणाला कुणाशी काही देणंघेणं नसतं. वेळही नसतो, तरीही समाजाची भीती असतेच,’’ बोलता बोलता आशुताई रडायला लागली.

मी तिला जवळ घेत म्हटलं, ‘‘ताई, तुम्ही, काळजी करू नका, आपण यावर नक्की तोडगा काढू. फक्त विचार करायला थोडा वेळ द्या.’’

आम्ही दोघं तिथून उठलो अन् बागेतल्या बाकावर येऊन बसलो. ‘‘आशुताई सांगते आहे ते जर खरं असेल तर यात तिचा काय दोष? पुरुषानं हवं तिथून शरीरसुख मिळवायचं अन् त्याच्या बायकोनं मात्र घुसमट सहन करायची हा कुठला न्याय?’’ मी म्हटलं.

आकाशनं मान हलवून संमती दर्शवली. तो म्हणाला, ‘‘तुझं म्हणणं खरंय, पण आईला कसं पटवून द्यायचं? ती तर आशुलाच दोष देणार?’’

मीही विचार करत होते ताई म्हणाली ते खरंय, स्त्रीच्याही शारीरिक गरजा असतातच ना? जर नवरा तिची शारीरिक भूक भागवू शकत नसेल तर तिनं काय करावं? खरं तर यात आशुची काहीच चूक नाही. समाजानं पुरुषाला झुकतं माप दिलंय म्हणून तो हवंय ते करेल का? जर तो शेजारी अन् आशू स्वखुषीनं एकत्र येताहेत तर हरकत काय आहे? जगात असे किती तरी लोक असतील.

‘‘आकाश, आपण आईंना समजावून बघूयात. प्रयत्न तर करायलाच हवा,’’ मी म्हटलं. तोही कबूल झाला.

शेवटी आम्ही आई व मुलांना घेऊन परत अमेरिकेत आलो आणि निशांत बोटीवरून घरी परतल्यावर पुन्हा लगेच मुंबईला आलो. आकाशनं निशांतला एकूण परिस्थितीबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं खरेपणानं आपल्या इतर संबंधांबद्दल कबूली दिली. ‘‘मी आशुपासून काहीही लपवलेलं नाही अन् तिलाही मी पूर्ण मोकळीक दिली आहे. फक्त आम्ही या गोष्टी आमच्यातच ठेवल्या आहेत. बाहेर हे कुणाला माहीत नाही. आकाश, तू अमेरिकेत राहतो आहेस, तुलाही यात काही प्रॉब्लेम वाटतो का?’’

‘‘प्रश्न माझा नाहीए. आईचा आहे. तिला कसं पटवून द्यायचं?’’

‘‘मी बोलेन त्यांच्याशी, उद्याच बोलतो.’’ निशांत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आटोपल्यावर निशांत आईजवळ बसले, ‘‘आई, मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर अन् आशुवर फार चिडला आहात. तुमचा रागही बरोबरच आहे. पण तुम्हीही जाणता की आमचं लग्न आमची संमती न घेताच तुम्ही मोठ्यांनी ठरवलंत. समाजाच्या रिवाजानुसार लग्न झालं, पण आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप नव्हतो, पुरक नव्हतो. आम्ही प्रयत्नही केला. पण कुठंतरी काही तरी बिनसलं हे खरं. निसर्ग नियमानुसार आम्हाला मुलंही झाली. म्हणजे संतानोत्पत्ती हा लग्नाचा उद्देश तर सफल झाला. पण आम्ही दोघंही संतुष्ट नव्हतो. पतिपत्नी म्हणून जी एकरूपता असावी ती आमच्यात नव्हती. कदाचित माझी भूक जास्तच असेल…त्यातून नोकरीमुळे मी सहा महिने घराबाहेर असतो. अशावेळी शरीराची गरज भागवायला मला दुसरा आधार शोधावा लागला. आशुलाही त्याच भावना आहेत. मी सुख भोगणार अन् माझी पत्नी इथं तळमळणार हे मला मान्य नाही. मीच तिला पूर्ण मोकळीक दिली आहे. तिला पूर्णपणे सुखावू शकेल अशा पुरुषाशी तिनं संबंध ठेवायला माझी हरकत नाही. त्यामुळे आम्ही दोघंही सुखी होतो अन् आमचे आपसातले संबंधही चांगले राहतात. एकमेकांविषयी आमच्या मनांत राग, द्वेष, संताप नाही…’’

आई अजूनही रागातच होती. निशांतलाही ते समजलं. त्यानं अत्यंत प्रेमानं अन् आदरानं आईचा हात आपल्या हातात घेतला, ‘‘आई, मला कळंतय, या गोष्टींमुळे तुम्ही खूप दुखावला आहात. तुम्हाला खूप रागही आला आहे. पण मला एक सांगा, एखाद्या जिवंत माणसाच्या आनंदापेक्षा निर्जीव रीतीरिवाज किंवा नियम कायदे महत्त्वाचे आहेत का? अन् या गोष्टी पूर्वीही घडतंच होत्या. अगदी आपल्या महाभारतातही असे दाखले आहेतच ना?’’

एवढं बोलून निशांतने इंटरनेटमधून डाऊनलोड केलेले महाभारतातले प्रसंग सांगायला सुरूवात केली. ‘‘पांडूला एका ऋषीनं शाप दिल्यामुळे तो पत्नीशी रत होऊ शकत नव्हता. पण त्याला पुत्र हवा होता, तेव्हा त्याची पत्नी कुंतीनं तिला मिळालेल्या वराचा उपयोग करून वेगवेगळ्या देवांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. महाभारतातली पांडवांच्या जन्माची कथा काय सांगते? तिथंही नवऱ्याखेरीज इतर पुरुषांची मदत घेतली गेली ना?’’

महाभारतातच द्रौपदीची कथा आहे. द्रौपदीला पाच पती होते. कारण आईनंच पाचही भावांना तिला वाटून घ्यायला सांगितलं होतं. अर्जुनाला सुभद्रा आवडली अन् तो तिला पत्नी म्हणून घेऊन आला. भीमाला हिंडिंबेपासून घटोत्कच नावाचा मुलगा होता. धृतराष्ट्र राजाचा मुलगा युयुत्सु तर म्हणे एका वेश्येपासून झाला होता.

आता तुम्हीच बघा, तुम्ही रोज महाभारत वाचता, अगदी श्रद्धेनं वाचता. त्यातला खरा अर्थ तुम्हाला लक्षात आलाय का? आयुष्य स्वेच्छेनं, आनंदात घालवा. हसतखेळत घालवा. फक्त एकच लक्षात ठेवा की तुमच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होता कामा नये, तुमचं सुख दुसऱ्याला दु:ख देऊन मिळवलेलं नसावं आणि कुणी कुणावर बळजबरी करू नये. असा साधा संदेश हे ग्रंथ देतात ना?

मग आज आम्ही, म्हणजे मी आणि आशु जर परस्पर सहमतीनं आमचं सुख मिळवतो आहोत तर त्यात गैर काय आहे? मी इथं नसताना तिनं मुलींना उत्तमरित्या एकटीनं वाढवलं, याचं मला कौतुक आहे, तिच्याविषयी अभिमान आहे. मी बोटीवर अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहतो. मुबलक पैसा मिळवताना मला सतत धोक्यांना सामोरं जावं लागतं. याबद्दल आशुच्या मनात माझ्याबद्दल कौतुक आणि आदर आहे. आम्ही पतिपत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र म्हणून राहतोय. यात चुकीचं काय आहे? आता तुम्ही समाजाचे नियम म्हणाला तर हे नियम केले कुणी? ज्यांनी कुणी हे नियम केले त्यांना समाजातला वेश्या व्यवसाय दिसत नाही? राजरोसपणे चालणारा शरीराच्या सौदेबाजार त्यांना खटकत नाही? हे नियम करणारे पुरुष असतात, स्वत:साठी पळवाटा काढतात अन् स्त्रियांना मात्र दु:खाच्या खाईत लोटतात. स्त्रियांना का हक्क नसावा हवं ते सुख मिळवण्याचा? नियम सर्वांसाठी सारखे असावेत. त्यात स्त्री पुरूष असा भेदभाव कशासाठी? अन् मी तर म्हणतो त्रासदायक ठरतील असे नियम, कायदे, कानून नसावेतच म्हणजे माणूस मुक्तपणे जगेल. नाहीतर मग चोरून लपवून काम करेल.’’

आई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून स्तब्ध झाल्या होत्या. नि:शब्द बसून होत्या. तिथंच बसलेली आशूताई गदगदून रडत होती. निशांतने उठून तिला मिठीत घेतलं. थोपटून  शांत शांत करत म्हणाला, ‘‘आशू, रडू नकोस, तुझं काहीही चुकलेलं नाहीए. माझ्याकडून  तुला पूर्ण मोकळीक आहे. तू तुझा आनंद मिळव.’’

खरं तर आईंना हे सगळं पचवायला जडच जात होतं पण निशांत आणि आशुताईंचे उजळलेले चेहरे बघून आम्ही ही सुखावलो होतो. वातावरणातला ताण कमी झाला होता.

आईंनी आशुताईला म्हटलं, ‘‘पोरी, मला क्षमा कर, फार वाईट वागले मी तुझ्याशी,’’ आशुनं आईला मिठीच मारली.

निशांतनं ज्या धीरगंभीरपणे अन् हुषारीने सर्व परिस्थिती हाताळली, त्याला तोड नव्हती. त्याच्या स्वच्छ मनाचं, प्रामाणिकपणाचं अन् समजावून सांगण्याच्या कसबाचं आम्हाला कौतुक वाटलं.

आकाश म्हणाला, ‘‘मला आता भूक लागलीये. आज आपण जेवण बाहेरूनच मागवू, निशांत जेवण ऑर्डर करतोस का?’’

निशांतनं लगेच विचारलं, ‘‘आई, पहिला पदार्थ तुम्ही सांगा?’’

वातावरण निवळलं. आम्ही आईंना घेऊन अमेरिकेत परत आलो. आता आईंना अमेरिकेतल्या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या. त्यांनी इथलं कल्चर समजून घेतलं होतं. मुलंही म्हणत होती, ‘‘आजी, आता बदलली आहे बरं का!’’

स्वार्थी प्रेम

कथा * जोगेश्वरी सधीर
खरं तर दीपाली दिसायला सुंदर होती. तिचं लग्न ठरण्यात कोणतीची अडचण
यायला नको होती. पण का कोण जाणे तिच्या आईवडिलांना त्यांच्या समाजातला
कुणी मुलगा पसंतच पडत नव्हता. देखण्या दीपालीचं लग्नाचं वय बघता बघता
निघून गेलं. वडील कॉलेजात प्रिन्सिपॉल होते. त्यांना कुणी योग्य मुलगा दिसतच
नव्हता.
शेवटी दीपालीनं एका गुजराती मुलाशी सूत जमवलं. अरूणचं अन् तिचं
प्रेमप्रकरण तीन चार वर्षं सुरू होतं. दीपालीचे वडील एव्हाना अंथरूणाला खिळले
होते. त्यांनी दीपालीला प्रेमविवाहाची परवानगी दिली.
दीपालीच्या लग्नासाठीच जणू वडिलांचे प्राण अडकले होते. तिचं लग्न झालं अन्
त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरूणचं दीपालीवर मनापासून प्रेम होतं. त्यानं
अत्यंत सन्मानानं दीपालीला आपल्या घरी आणलं. घरातलं वातावरण कट्टर
गुजराती होतं. घरचा चांगला व्यवसाय होता. आर्थिक बाजू भक्कम होती. पण
सासूचा, कांतीबेनचा स्वभाव काही फटकळ दीपालीला आवडत नव्हता. अरूणचं
आभाळभर प्रेम मिळत असूनही तिची चिडचिड चालू असायची.
कांतीबेन अन् नारायण भाई हे जोडपं अत्यंत सरळमार्गी होतं. सामान्यपणे
गुजराती कुटुंबात सुनेनं साडी नेसावी, डोक्यावरून पदर घ्यावा. तोकडे, लांडे कपडे
घालू नयेत असे संकेत असतात. आपल्या सुनेनं ते पाळावेत अशी कांतीबेनची
अपेक्षा असणं यात गैर काहीच नव्हतं.

अरूण दीपालीला शांतपणे समजवायचा. थोडं धीरानं घे. सगळं चांगलं होईल
म्हणून सांगायचा पण हट्टी अन् मानभावी दीपालीला ते मान्य नव्हतं. एक
दिवस चिडून, भांडण करून ती माहेरी निघून गेली. आईनंही तिला समजूत घालून
परत पाठवण्याऐवजी उलट तिला अधिक भडकण्यातच धन्यता मानली.
दीपालीची बहीण राजश्री तर स्वत:च्या संसाराचा खेळखंडोबा करूनच बसली
होती. आता दीपालीच्या बाबतीतदेखील तिनं आगीत तेल ओतायचं काम सुरू
केलं. सासूला चांगली अद्दल घडवूया असं ती दीपालीला सांगायची.
मूर्ख दीपालीनं आई व बहिणीच्या सांगण्याप्रमाणे अरूणचं प्रेम ठोकरलं. बिचारा
अरूण किती वेळ यायचा. घरी चल, प्रेमानं संसार करू म्हणून विनवायचा पण
दीपाली ढम्म होती.. अरूणचं प्रेम तिला कळतंच नव्हतं. तिच्या आईलाही
विवाहित मुलगी माहेरी येऊन राहते याचं काही वाटत नव्हतं.
माहेरी दीपाली फक्त आराम करायची. दिवसभर तिची वहिनी एकटीच घरातली
कामं करत असायची. आई अन् दीपाली सकाळ संध्याकाळ भटकायला जायच्या.
घरात अन् बाहेर मनसोक्त हादडायच्या.
शरीराला कोणतीच हालचाल नसल्यानं अन् दिवसभर चरत राहिल्यानं दीपाली
आता चांगलीच गरगरीत झाली होती. अरूणला ओळखणाऱ्या लोकांना दीपालीचा
राग यायचा आणि अरूणची कीव यायची. दीपालीच्या ओळखीतले, नात्यातले
लोकही तिला टाळायला बघायचे. कारण अरूणचा चांगुलपणा त्यांनाही दिसत
होता. वारंवार तो तिला येऊन भेटत होता, घरी चल म्हणत होता ही गोष्ट
लोकांपासून लपून राहिलेली नव्हतीच.
दीपाली मजेत खातपीत, भटकंत होती. अरूण मात्र बायको सोडून गेल्यामुळे फार
दु:खी होता. त्याच्या आईवडिलांनादेखील वाटायचं. मुलाचा संसार बहरावा, आपण
नातवंडं खेळवावीत. पण हट्टी दीपाली सासरी गेलीच नाही. अरूणनंही आता
तिला भेटणं कमी केलं. फोन मात्र तो आवर्जून करायचा. अरूणनं दीपालीकडे

घटस्फोट मागितला नाही. त्याचं इतर कुठं प्रेमप्रकरण नव्हतं. आढयतेखोर
दीपाली घरी येत नव्हती. घटस्फोट देऊन अरूणला मोकळंही करत नव्हती.
अरूणचं मात्र दीपालीवर मनापासून अन् खरंखुरं प्रेम होतं. दीपालीशिवाय तो इतर
कुणाचा विचारही करू शकत नव्हता. बिचारा एकटाच आयुष्याचा आला दिवस
ढकलत होता. हल्ली त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नसायची. एकटाच आपल्या
विचारात दंग असायचा. एक दिवस असाच आपल्या नादात दुकानातून निघून
घरी येत असताना एका ट्रकशी त्याच्या कारचा अपघात झाला. डोक्याला फार
मोठी जखम झाली.
नारायण भाई अन् कांतीबेननं दीपालीला त्याच्या अपघाताची बातमी दिली. ती
भेटायला येईल असं त्यांना वाटत होतं. पण दीपाली काय किंवा तिची बहिण
अन् आई काय कुणीही त्याला बघायला इस्पितळात गेलं नाही. उलट त्या
परीस्थितीत दीपालीच्या आईनं अरूणच्या वडिलांना सांगितलं की दीपाली व
अरूणसाठी वेगळा ब्लॉक करून द्या.
अरूणचा अपघात जबरदस्त होता. तो त्यातून वाचला हेच नशीब. एवढी गंभीर
दुखापतही तो शांतपणे सोसत होता. आईवडिल त्याची सेवाशुश्रुषा करत होते. त्या
सगळ्या गडबडीत दीपालीसाठी वेगळा फ्लॅट घेणं, तो सजवून, सामानानं परीपूर्ण
करून घेणं, नारायणभाईंना जमलंच नाही.
एकुलत्या एक मुलाच्या सुखासाठी आईवडिल त्याचं वेगळं घर मांडून द्यायलाही
तयार झाले होते. पण निदान दीपालीनं येऊन नवऱ्याला भेटावं. त्याच्याजवळ
बसावं एवढी त्यांची इच्छाही त्या स्वार्थी मुलीला पूर्ण करावी असं वाटलं
नाही.काही महिने इस्पितळात काढून अरूण घरी आला. या काळात दीपाली
फक्त आपल्या नव्या फ्लॅटबद्दल चौकशी करत होती. जखमी, दुर्बळ झालेल्या
नवऱ्याला, तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अरूणला भेटावं असं तिला
एकदादेखील वाटलं नाही.

अरूणला घरी आणल्यावर त्याचे वडिल त्यांच्या वेगळ्या फ्लॅटच्या व्यवस्थेला
लागले. वेगळं घर करून का होईना मुलाचा संसार सुखाचा होऊ दे, तो आनंदात
राहू दे एवढंच त्यांना वाटलं होतं.
पण अरूणला हे कळलं, तेव्हा त्याचं मन फारच दुखावलं. ज्या दीपालीवर आपण
वेड्यासारखं प्रेम केलं, ती दीपाली इतकी आत्ममग्न अन् स्वार्थी असावी हे त्याला
सहनच होईना. तो अगदी मिटून गेला. त्याचं हसणं, बोलणं कमी झालंच होतं, ते
आता पूर्णपणे बंद झालं. इतक्या महिन्यांत त्यानं दीपालीला फोन केला नव्हता.
तिनंही फोन केला नाही, येणं तर दूरच!
यापुढे तरी नव्या फ्लॅटमध्ये येऊन दीपाली सुखानं नांदेल याची त्याला शाश्वती
वाटेना. दीपालीवरच्या त्याच्या एकतर्फी का होईना, निस्सीम प्रेमामुळेच तो एवढे
दिवस जिवंत होता, पण आता त्याच्या मनांत फक्त निराशा होती. आयष्यातून
दीपाली गेली तरी त्याच्या मनांतली प्रेम भावना जिवंत होती. आता मात्र ते प्रेम
पार आटलं, नाहीसं झालं. आता त्याच्या जगण्याला काही अर्थच नव्हता.
हातापायाच्या जखमा आता बऱ्यापैकी भरून झाल्या होत्या. डोक्यावरचं बँडेज
मात्र अजूनही होतंच. विचार करून त्याचं डोकं भणभणत होतं. रात्री झोप
लागेना. आईवडिल शेजारच्या खोलीत झोपले होते.
तिरीमिरीत अरूण उठला अन् खोलीतून जिन्याकडे निघाला. अंधारात पायरी
दिसली नाही अन् तो जिन्यावरून गडगडत थेट खाली पोहोचला. क्षणार्धांत जीवन
ज्योत मालवली.
अत्यंत गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या अरूणला भेटायला दीपाली गेली
नव्हती, मात्र त्याच्या मृत्युची बातमी कळताच ती आपली आई, भाऊ, बहीण व
भाओजींना घेऊन नवऱ्याच्या संपत्तीतला वाटा मागायला आली.

तिच्या निर्लज्जपणानं सगळेच चकित झाले होते. एक गरीब स्वभावाच्या सज्जन
मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या त्या स्वार्थी, आप्पलपोट्या मुलीला बघून
सगळ्यांच्याच मनांत येत होतं की त्या निरागस मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश
करून ही बया सासू सासऱ्यांकड संपत्तीतला वाटा कशी मागू शकते? यालाच प्रेम
म्हणतात? असा प्रेमविवाह असतो?

बाजारीकरण

कथा * रूचिता साठे

आज सकाळपासूनच नीलाचं डोकं खूप दुखत होतं. कामात चित्त लागत नव्हतं.
सारी रात्र विचार करण्यात गेल्यामुळे रात्री डोळा लागलाच नव्हता. काय करावं?
करावं की करू नये? एकीकडे मुलीच्या शिक्षणाची काळजी दुसरीकडे तिच्या
शिक्षणासाठी पैसे उभे करण्याची काळजी. एकुलत्या एक मुलीला शिक्षण बंद कर
सांगायचं कसं? पण एका मुलीच्या शिक्षणाला किती लाख रूपये लागतात हेही
आधी कळलं नव्हतं. नवऱ्याची नोकरी साधारण, कमाई तुटपुंजी…तेवढ्यात
कसाबसा घरखर्च भागतो. थोडी मदत म्हणून नीलाही एक बारकीशी नोकरी
करतेय. पण ती फारशी शिकलेली नाही. तिला बऱ्या पगाराची नोकरीही करता
येत नाही. ती फार काळजीत आहे.

जर तिनं सरोगेट मदर होण्याचं ठरवलं तर तिचा नवरा सहमती देईल का? लोक
काय म्हणतील? परिचित व नातलगांची प्रतिक्रिया काय असेल? नीलाचे विचार
थांबत नव्हते.तेवढ्यात तिला अनिताची हाक ऐकून आली.

‘‘कसल्या काळजीत आहेस नीला? कपाळावर किती आठ्या घातल्या आहेस?’’
‘‘अगं, निशाच्या फिचीच काळजी आहे. पैसे भरायची मुदत आता संपत आली
आहे. अजून पैशांची सोय झाली नाहीए. नातलगही श्रीमंत नाहीत जे मदत करू
शकतील अन् केलीच मदत तर मी ते पैसे फेडणार कसे? घरी जाते अन् पोरीचे

उदास डोळे बघितले की पोटात तुटतं. इथं काळजीमुळे कामात लक्ष लागत
नाही.’’ नीलानं मैत्रिणीपाशी मन मोकळं केलं.
‘‘मला समजतेय गं तुझी ओढाताण…म्हणूनच मी तुला सरोगेट मदरबद्दल
सांगितलं होतं. अगं, त्यात काही वाईट किंवा कायद्याविरूद्ध वगैरे नाहीए.
कित्येक स्त्रियांना गर्भाशयातील दोषामुळे मूल जन्माला घालता येत नाही.
अशावेळी ती कुणा स्त्रीचं गर्भाशय भाड्यानं घेते. त्या स्त्रीचं मूल सरोगेट मदर
नऊ महिने आपल्या गर्भाशयात वाढवते अन् मूल जन्माला आल्याबरोबर
आईवडिलांच्या स्वाधीन केलं जातं.
‘‘गर्भाशय भाड्यानं देणाऱ्या स्त्रीच्या आरोग्याची सर्व काळजी ते कुटुंब घेतं.
तिच्यावर बाळाची काहीही जबाबदारी नसते. तिचा त्या संततीवर हक्कही नसतो.
त्या पतिपत्नीच्या स्त्रीबीज व पुरूष बीजाचं मिलन काचेच्या परीक्षण नळीत
प्रयोग शाळेत घडवून ठेवलं जातं. यात गैर किंवा अवैधानिक काहीच नाही.
सरोगेट आईला भरपूर पैसा मिळतो. तुलाही मिळणाऱ्या पैशात मुलीचं शिक्षण
पूर्ण करता येईल.’’ अनितानं समजावलं.
‘‘अनिता, तू माझ्या भल्यासाठीच सांगते आहेस. हे मला ठाऊक आहे पण माझे
पती याला मान्यता देतील का हे मला समजत नाहीए.’’ नीलानं आपली अडचण
सांगितली.
‘‘पुन्हा परिचित, नातलग…त्यांची तोंडं कशी बंद करायची?’’
‘‘हे बघ, तू फक्त नवऱ्याला समजव, त्याची संमती घे.’’ अनितानं म्हटलं, ‘‘मग
इतरांची काळजी करायची नाही. तसंही निशाला कोट्याला जावंच लागेल. तुलाही
एकदा गर्भाशय भाड्यानं दिलं की ‘लिटिल एंजल्स सेंटर’मध्येच रहावं लागेल.
तिथंच सर्व सरोगेट मदर्स राहतात. नातलगांना सांगता येईल मुलीच्या
शिक्षणासाठी मी तिकडे जातेय. अधुनमधून नवरा तुला भेटून जाईल…बघता

बघता नऊ महिने जातात गं! पैसा आला की इतर गोष्टीही सोफ्याच होतात.’’
अनितानं परोपरीनं नीलाला समजावलं.
नीलाला तिचं म्हणणं पटलं. रात्री नवऱ्यापाशी विषय काढला. प्रथम तर त्यानं
स्पष्ट नकारच दिला, पण नीला आता निर्णयावर ठाम होती.
‘‘हे बघा, आपला काळ वेगळा होता. गरीबीमुळे आपण शिकू शकलो नाही. त्या
काळातही सरकारी शाळेत शिकलेली मुलं पुढे शिकून डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर
झाली, पण आताचा काळ वेगळा आहे. स्पर्धा फार वाढली आहे. मुलांना चांगल्या
कॉलेजात प्रवेश घेण्यासाठाही आधी कोचिंगक्लास करावा लागतो.’’

‘‘आपल्याला एकच मुलगी आहे. तिला उत्तम शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे.
तिला कोटा शहरातल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये अॅडमिशनही मिळालं आहे.
फक्त फी भरायची आहे. शिवाय तिथला राहण्याजेवण्याचा खर्च…या सगळ्यासाठी
पैसा हवाय. शिवाय पुढलं इंजिनियरिंगचं शिक्षण…ते तरी फुकट होणार आहे का?
इतका पैसा उभा करण्यासाठीच मी एक पर्याय निवडला आहे. त्यात अनैतिक,
कायद्याविरूद्ध किंवा कुणाला दुखवून लुबाडून असं काहीच करायचं नाहीए.

‘‘फक्त नऊ महिन्यांचा प्रश्न आहे. माझं गर्भाशय मी एखाद्या श्रीमंत
दाम्पत्यांला भाड्यानं देणार. त्यांचं मूल माझ्या गर्भाशयात वाढणार. त्याचा
मोबदला म्हणून मला दहा लाख रूपये मिळतील. नऊ महिने झाले, बाळ
जन्माला आलं की मी त्यांना ते सोपवणार की माझी जबाबदारी संपली. या नऊ
महिन्यांत माझ्या आरोग्याची काळजी, खाणं, पिणं, आौषधपाणी, राहणं वगैरे सर्व
व्यवस्था ते कुटुंब करणार. तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका. मुलीच्या बरोबरीनं
आपलाही प्रश्न आहेच. कायदेशीर मार्गानं पैसा मिळतोय तर त्याचा फायदा
घ्यायला हवा ना? फक्त बाहेर कुणाला काही कळू द्यायचं नाही एवढी जबाबदारी
तुमची.’’

अशी केली युक्ती

मिश्किली * पारुल पारवे

‘‘प्रिया, कुठं आहेस तू? जरा चाखून बघ आणि सांग बरं, भाजी कशी झाली आहे?’’ सासूबाईंची अशी हाक ऐकली की माझी भीतिनं गाळण उडते. अगदी निर्मनुष्य रस्त्यावर एखाद्या जुनाट पडक्या हवेलीतून काही आवाज ऐकल्यावर एकट्या वाटसरूची कशी अवस्था होईल तशी माझी अवस्था होते. म्हणजे माझ्या सासूबाई चेटकिणीसारख्या भेसूर, विद्रूप वगैरे नाहीएत. त्या छान गोऱ्यापान, सुंदर, नीटनेटक्या, थोडक्यात म्हणजे सुनेला चॅलेंज देणाऱ्या मॉडर्न सासूबाई आहेत.

आता तुम्ही म्हणाल, मग एवढं घाबरण्याचं कारण काय? घाबरायला होतं त्यांच्या स्वयंपाकामुळे, होय स्वयंपाकामुळेच निसर्गानं त्यांना रूप, सौंदर्य भरभरून दिलं, पण स्वयंपाकाची कला अजिबातच दिली नाही. माहेरी सुंदर म्हणून खूप कौतुक झालं. स्वयंपाकघरात कधी पाय ठेवला नाही. स्वयंपाक कधी केलाच नाही. सासरी सौंदर्याचं कौतुक नव्हतं. झपकन स्वयंपाक करावा लागला. पण त्यांनी काय शिजवलं अन् घरातल्यांनी काय खाल्लं याचा कधी ताळमेळ बसला नाही.

घरातली पुरूष मंडळी उगीच वाद घालत बसली नाहीत. त्यांनी घरातल्या जेवणाचा अनादर करायचा नाही म्हणून पहिलं वाढलेलं जेमतेम संपवून हात धुण्याचा मार्ग निवडला…मग उदर भरण्यासाठी बाहेर हॉटेल्स, रेस्टॉरंट, टपऱ्या, धाबे असं खूप काही असतंच, पण घरात अजून एक सदस्य आहे ज्यांना सासूबाईंचं रूप काय, रांधणं काय, काहीच आवडलं नाही. या म्हणजे माझ्या दुसऱ्या सासूबाई. नाही नाही गैरसमज नको. माझे सासरे खूपच सज्जन आहेत. त्यांचं एकच लग्न झालंय. या दुसऱ्या सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या थोरल्या जाऊ. म्हणजे माझ्या सासूबाईच झाल्या ना! यांना माझ्या सासूचं पाककौशल्य अजिबात आवडत नाही. त्या म्हणतात, ‘‘कधी आपल्यासारख्या फक्क गोऱ्या भाज्या करते, म्हणजे तिखट, हळद, मसाले काहीच न वापरता भाज्या करते तर कधी सूड उगवल्यासारख्या काळ्या ठिक्कर…म्हणजे भाज्या जाळून ठेवते…एकूण स्वयंपाक बेचवच!’’

आता या घरातली सध्या तरी मी एकुलती एक सून. त्यातून नाव प्रिया. मला सगळ्यांची प्रिय बनून राहणं भाग आहे. सुरूवातीला मी दोघींनाही खुश ठेवण्यासाठी त्या म्हणतील तसं करायची. परिणाम असा झाला की एकीचं ऐकलं की दुसरीला वाटे मी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानांत गेलेय. एक माझा हात धरून तिच्याकडे ओढायची, दुसरी माझी पाय धरून तिच्याकडे ओढायची.

काही दिवस बेचव जेवण जेवल्यावर माझं वजन कमी झालं, कारण मला घराबाहेर पडायची सोय नव्हती. मग मी माझ्या सासूबाईंना अगदी प्रेमानं म्हटलं, ‘‘सासूबाई, आता मी आलेय ना, आता या वयात तुम्ही स्वयंपाक कशाला करता? मी करत जाईन दोन्ही वेळचा स्वयंपाक.’’हे ऐकताच त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला, ‘‘या वयात म्हणजे काय? माझं काय वय झालंय का? तुझ्यापेक्षा जास्त काम करू शकते मी. अन् हे माझं घर आहे.मला हवे तेवढे दिवस मी काम करेन.’’

त्यांना कसं समजावून सांगू की सगळ्या भाज्या मला विनवताहेत, बाई गं, तुझ्या सासूच्या तावडीतून आम्हाला सोडव. खरंतर घरातील सर्वांवरच अत्याचार सुरू होता, पण उगीच बोलून वाईटपणा कोण कशाला घेईल?

खरं तर तो बेचव स्वयंपाक बघूनच माझी भूक मरायची. तो स्वयंपाक पाण्याच्या घोटाबरोबर घशाखाली ढकलताना जीभ सहकार्य नाकारायची. नातं सासूसुनेचं. कसं सांगायचं त्यांना? पुन्हा मी नवी एकुलती एक सून…रोजच मला त्या विचारायच्या, ‘‘स्वयंपाक चांगला झालाय ना?’’ मी त्यांच्या नजरेला नजर न देता इकडेतिकडे बघत म्हणायची, ‘‘बरा झालाय की!’’

एवढ्यावर सगळं थांबलं असतं तर प्रश्नच नव्हता. नेमकं अशावेळी दुसऱ्या सासूबाई प्रगट व्हायच्या, ‘‘कालच्या भाज्यांचा रंग तर बघवत नव्हता बाई! भाजी उपवर कन्या म्हणून उभी असती तर लग्न झालंच नसतं. कुष्णी कुष्णी पसंत केली नसती. इतकी वर्ष लग्नाला झालीत, पण एक दिवस धड जेवायला मिळालं नाहीए.’’ (आता या मोठ्या होत्या तर त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा घ्यायला काय हरकत होती?)

त्यांनी एवढं म्हणताच धाकट्या सासूबाईंना एकदम जोर चढला. त्या माझ्याच साक्ष काढतात, ‘‘काय गं प्रिया, काय वाईट होता स्वंयपाक? यांना तर माझ्या प्रत्येक कामात दोष काढायला फारच आवडतं, लग्न होऊन आल्यापासून यांनी कधी प्रेमाचा शब्द उच्चारला नाहीए. कधी जिवाला विसावा नाही मिळाला.’’

दोघी सासवा माझ्या  खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकींवर फैरी झाडतात. मधल्यामध्ये माझी कुंचबणा होते. मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायचं होतं. मी सतत विचार करत होते. शेवटी एक आशेचा किरण दिसला. दुसऱ्याच दिवशी मी जाहीर केलं की आजपासून मी एक स्पेशल डाएट प्लॅन माझ्यापुरता तयार केलाय अन् तो मी अंमलातही आणणार आहे. मी काय खायचं, केव्हा खायचं, कसं खायचं हे सगळं मीच ठरवणार आहे तर रोजच्या स्वयंपाकात मला धरू नका. ही योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली. एकतर त्या बेचव स्वयंपाकातून सुटका झाली, दुसरं म्हणजे दोघी सासूबाईंच्या ओढाताणीतून मला मोकळीक मिळाली. पण पंधरा वीस दिवसातच मी त्या डाएट प्लॅनला कंटाळले. आता पुन्हा घरच्या त्या बेचव स्वयंपाकाला शरण जाण्याखेरीज पर्याय नव्हता. पुन्हा तेच, ये रे माझ्या मागल्या…

मी डाएट प्लॅन बंद केल्यावर तर सासूबाईंचा उत्साह अजूनच ओसंडू लागला. त्या काहीतरी शिजवून आणायच्या अन् ‘‘प्रिया बघ बरं, सांग चव कशी आहे?’’ असं म्हणून मला खायला द्यायच्या. मी एखादा कोपरा मला कुशीत घेईल का म्हणून बघायची. म्हणजे त्यांच्या नजरेला पडायला नको किंवा वाऱ्याचा जोराचा झोत तरी यावा अन् त्यानं मला दुर कुठं तरी उडवून न्यावं असं वाटायचं. पण त्यातलं काहीच प्रत्यक्षात येत नसे. एकदा एक मैत्रीण घरी आली होती. तिनं अमेरिकेतून चुइंगम आणलं होतं. एक मी

सहज म्हणून तोंडात टाकलं. नेमक्या त्याचवेळी सासूबाई कशाची तरी चव दाखवायला म्हणून आल्या. मी म्हटलं, ‘‘माझ्या तोंडात चुइंगम आहे.’’

त्या बिचाऱ्या हिरमुसल्या होऊन परत किचनमध्ये निघून गेल्या. मला एकदम कल्पना सुचली, आता त्या मला चव दाखवायला आल्या की मी म्हणायची ‘‘माझ्या तोंडात चुइंगम आहे.’’

काही दिवस असे गेले. पण सासूबाई माझ्यापेक्षा हुशार होत्या. आता त्या स्वयंपाकघरातूनच मला हाक मारायच्या, ‘‘प्रिया, जरा इकडे ये बरं.’’

मी तिथं गेले की पटकन् विचारायच्या, ‘‘तोंडात चुइंगम नाहीए ना?’’ मी कावरीबावरी व्हायची, त्या पटकन् काहीतरी मला खायला द्यायच्या. एकूण ‘चव बघणं’ या कामातून मला सुटका नव्हती.

एकदा सासूबाईंनी कुठं तरी वाचलं की मोहरीचं तेल हार्ट अॅटकपासून वाचवतं. त्यानं आरोग्य चांगलं राहतं. इतर तेलांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल फार अधिक प्रमाणात असतं. झालं! त्या दिवसापासून आमच्याकडे सरसोंचं म्हणजे मोहरीचं तेल स्वंयपाकात वापरलं जाऊ लागलं. इकडे थोरल्या सासूबाईंनी फर्मान काढलं, ‘‘मला मोहरीच्या तेलाची अॅलर्जी आहे. मी त्या तेलातला स्वयंपाक खाणार नाही. पुन्हा  मधल्यामध्ये माझी पंचाइत झाली. भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये समझोता कसा करावा मला सुधरत नव्हतं. मला खूपच टेंशन आलं. त्यावर उपाय सापडत नव्हता.’’

मला वाटलं लवकर या समस्येवर उपाय मिळाला नाही तर माझं बी.पी. तरी वाढेल, माझी शुगर तरी शूट होईल नाही तर मी डिप्रेशनमध्ये तरी जाईन. नवरोजीला काही म्हणण्यात अर्थच नव्हता. माझी समस्या त्यांना समजणारच नव्हती. रात्रभर मी विचार करत होते, तळमळत होते, अन् शेवटी मी एका निर्णयाप्रत पोहोचले होते.

सकाळी न्याहारीच्या वेळी मी माझ्या दोन्ही सासूबाईंना सांगितलं की माझ्या माहेरची एक नातलग स्त्री आहे. काही कारणानं त्यांची आर्थिक परिस्थिती घसरली आहे, त्यांना स्वयंपाकाचं काम मिळालं तर हवंय. आपण त्यांना कामावर ठेवून घेऊ. त्यांना आर्थिक मदत होईल अन् त्या स्वयंपाकघर पूर्णपणे सांभाळतील.

आधी तर दोघींनी एकजुटीनं विरोध केला. ‘‘कशाला उगीच! आहोत की आपण करायला, खर्च वाढेल ना? वगैरे वगैरे…’’ मग मी जरा कठोरपणे अन् अगदी ठामपणे

सांगितलं, ‘‘मग मी त्यांना दर महिन्याला काही पैसे तसेच देईन. त्यांना काम द्यायचं नसेल तर नका देऊ.’’

मग दोघींनी एकदमच सूर बदलला, ‘‘चल, येऊ देत त्यांना, गरजू आहेत, कष्ट करून पैसा मिळवू बघताहेत, आपण मदत नाही करायची तर कुणी करायची? वगैरे वगैरे.’’ मी मनांतल्यामनांत जाम खुश झाले, आता चांगल्या चवीचा स्वयंपाक होणार अन् पोटभर जेवता येणार, कारण मी एका चांगल्या स्वयंपाकिणीशी बोलणी करून ठेवली होती. आता जे काय करायचं ते ती बघून घेईल. दुसऱ्यादिवशी बरोबर अकरा वाजता दरवाज्याची घंटी वाजली. मी दार उघडलं. दारात ‘ती’ होती. माझ्या समस्येचं उत्तर…दोन सासवांच्या जात्यात मी उगीचच भरडून निघत होते. शेवटी उपाय सापडला. तिलाही आधीच घरातली परिस्थिती समजावून सांगितली होती. ती म्हणाली, ‘‘मी बघेन सगळं. घेईन सांभाळून, तुम्ही काळजी करू नका.’’

अन् मी निश्चंत झाले.

दुसरी बाजू

कथा * गरिमा पारवे

‘‘माया , तू चढ बरं आधी…नेहा, अदिलला माझ्याकडे दे, अगं, अगं…साभांळून,’’ गाडी सुटायला केवळ पाच मिनिटं उरलेली…सीमानं आपलं सामान व्यवस्थित लावून पर्समधलं मासिक हातात घेतलंच होतं तेवढ्यात डब्याच्या दारातून येणाऱ्या त्या आवाजानं अगदी अभावितपणे तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली.

हाच तो आवाज जो सीमाला कधी काळी फार आवडत होता. आवाजात गांभीर्य होतंच पण एक मधाळ, मादक अशी किनार होती. इतकी वर्षं उलटली तरी सीमा त्या आवाजाच्या आकर्षणातून मुक्त झाली नव्हती. अजूनही कधी तरी वाटायचं की अचानक हा आवाज तिला साद घालेल आणि जे तिला त्यावेळी ऐकावसं वाटलं होतं ते सांगेल.

आज किती तरी वर्षांनी सीमानं तो आवाज ऐकला होता, पण त्या आवाजात त्यावेळी असलेला सच्चेपणा अन् तो मधाळ गोडवा नाहिसा झाला होता. आवाजात सच्चेपणाऐवजी त्रागा अन् गोडव्याऐवजी कोरडी खरखर जाणवंत होती. तो कधी हमालावर डाफरत होता, बायकोवर खेकसत होता, मुलांवर ओरडत होता…आयुष्यातल्या काटेरी वाटेवरून चालताना असं घडतंच का? की त्या दोघांमध्ये त्या काही निर्माण झालेल्या दुराव्यामुळे असं घडलं होतं?

बरेचदा दोन व्यक्तींमधलं नातं अबोलच राहतं. अंतर कमी होत नाही पण हृदयातली कळही जिरत नाही. सीमाचं अन् त्या आवाजाच्या मालकाचं म्हणजे नवनीतचं नातं असंच काहीसं होतं. सीमाला फारच उत्सुकता होती त्याला एकदा बघायची. दहा बारा वर्षं उलटली होती. ती सीटवरून उठली अन् दरवाज्याकडे बघू लागली. एक माणूस आपल्या बायकोमुलांसह येताना दिसला.

सीमानं लक्षपूर्वक बघितलं…नवनीतचे डोळे फक्त पूर्वीचे होते. पण तो मूळ वयापेक्षा खूपच वयस्कर दिसत होता. पूर्वीचे दाट केस जाऊन बऱ्यापैकी टक्कल पडलं होतं. शरीरावर चरबीचे थर साठले होते. ढेरपोट्याच दिसत होता. डोळ्यातले पूर्वीचे खेळकर मिश्किल भाव नाहीसे होऊन त्या जागी गर्व अन् धूर्तता विराजमान झाली होती. कॉलेजच्या दिवसांतला हाच का तो हॅन्डसम नवनीत?

नवनीतची नजर सीमाकडे गेली, पण त्यानं तिला ओळखली नाही. ही कोण सुंदर मुलगी म्हणून उत्सुकतेनं अन् थोड्याशा वासनेनंच त्यानं तिच्याकडे बघितलं. सीमा त्याची नजर चुकवून आपल्या सीटवर येऊन बसली. ती नजर तिला सहनच झाली नाही.

कॉलेजातले ते एकत्र असण्याचे दिवस. सीमा त्यावेळी अगदीच साधी आणि अनाकर्षक वाटायची, पण नवनीत मात्र स्मार्ट, हॅन्डसम दिसायचा. सीमा त्याच्याकडे आकर्षित झाली होती. इतर कुणाशी न बोलताही सीमा त्याच्याशी बोलण्याची संधीच शोधत असायची.

पण आता काळ बदलला होता. चांगली शैक्षणिक गुणवत्ता, त्यामुळे मिळालेली उत्तम पगाराची, उच्च पदाची नोकरी, त्यातून आलेलं आत्मविश्वासाचं तेज अन् एकूणच अभिरूची जाणवेल असं राहणीमान यामुळे सीमा खूपच आकर्षक वाटू लागली होती. नियमित पायी फिरणं, योगासनं, प्राणायाम आपण मोजका आहार यामुळे ती खूपच तरूण दिसायची. कुठलाही पोषाख तिला शोभून दिसायचा.

मासिकाची पानं उलटता उलटता सीमा विचार करत होती. मागील इतक्या वर्षांत तिला नवनीतची आठवण आली नव्हती असं नाही. फेसबुकवर बघितलं होतं. त्याचा नंबरही टिपून घेतला होता..पण कधी फोन केला नाही की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही.

आत्ता प्रवासात बऱ्यापैकी वेळ होता. करूयात का थोडं चॅटिंग? निदान कळेल तर तो माणूस खरोखर नवनीत आहे की अजून कुणी दुसराच आहे? तिनं व्हॉट्सअॅपवर नुसतंच ‘हाय’ टाइप करून पाठवलं.

ताबडतोब उत्तर आलं, ‘‘कुठं आहेस? कशी आहेस?’’

ती दचकली. तिला ओळखायला त्याला क्षणभरही लागला नव्हता. प्रोफाइल पिक सीमानं एडिट करून रंगीबरेंगी केलं होतं. चेहराही खूप स्पष्ट नव्हता. पण त्यानं कदाचित ट्रू कॉलरमुळे ओळखलं असेल.

‘‘मला आळखलंस? आठवतेय मी तुला?’’

‘‘१०० टक्के आठवते आहेस आणि इतरही सगळं.’’

‘‘इतरही सगळं म्हणजे?’’ सीमानं दचकून विचारलं.

‘‘तेच…तू अन् मी मिळून ठरवलं होतं?’’

सीमानं उत्तर दिलं नाही.

नवनीतचा पुन्हा मेसेज आला, ‘‘हल्ली कुठं आहेस? काय करतेस?’’

‘‘दिल्लीत आहे. जॉब करतेय.’’ सीमानं उत्तर लिहिलं.

‘‘गुड.’’ त्यानं स्माइली पाठवली.

‘‘तू सांग, घरी सगळे कसे आहेत? दोन मुलं आहेत ना तुला?’’ सीमानं विचारलं.

आता दचकायची पाळी नवनीतची होती. ‘‘तुला कसं माहीत?’’

‘‘बस्स, असंच! माहिती करून घ्यायची इच्छा असली की सगळं होतं.’’ सीमानं त्याच्या विचारांचा कल जाणून घेण्यासाठी म्हटलं.

ताबडतोब त्याचा प्रश्न आला, ‘‘तुझं लग्न झालं?’’

‘‘नाही, अजून केलं नाहीए. कामातच गुंतलेली असते. आनंदात असते.’’

‘‘मला तर वाटलं होतं तुझ्याशी पुन्हा संपर्क तरी होतोय की नाही? पण तू आजही माझ्यासाठी फ्री आहेस तर!’’ नवनीतच्या भावना आता बाहेर डोकावू लागल्या होत्या. सीमाला त्याची भाषा अन् त्याचा स्वर आवडला नाही.

‘‘चुकीचा विचार करतो आहेस. मी कुणासाठीही फ्री नाही. सहजच तुझ्याशी संवाद साधला!!’’

‘‘मी पण हेच म्हणतोय.’’

‘‘तेच काय?’’

‘‘हेच की तुझ्या हृदयात मी आहे कित्येक वर्षांपूर्वी जसा होता, तसाच आहे.’’ नवनीतचा मेसेज आला.

बराच वेळ सीमानं काही उत्तर पाठवलं नाही. नवनीतनं पुन्हा मेसेज पाठवला,

‘‘आज तुझ्याशी संपर्क झाला, खूप बरं वाटलं. नेहमीच चॅटिंग करूयात.’’

‘‘ओ. के?. शुअर!’’

सीमाच्या मनांत विचित्र वादळ होतं. चांगलंही वाटलं अन् बऱ्यापैकी आश्चर्यही वाटलं. नेमकं कसं रिअॅक्ट व्हावं हेच तिला समजत नव्हतं. तिनं पुन्हा एक मेजेस टाकला.

‘‘बाय द वे, आता कुठं आहेस?’’

‘‘आता मी ट्रेनमध्ये आहे अन् बनारसला जातोय.’’

‘‘विथ फॅमिली.’’

‘‘होय!’’

‘‘ठीक आहे, एन्जॉय.’’ सीमानं फोन पूर्णपणे बंद करून ठेवला. म्हणजे तो नवनीतच आहे हे तर नक्की झालं. सीमा विचार करत होती, आयुष्यही किती अन् कसं बदलतं? जुन्या आठवणींच्या नादात मग तिचा पुढला प्रवास मजेत पार पडला.

घरी आल्या आल्या सीमाची कामं सूरू झाली. त्या धबडग्यात ती नवनीतला पार विसरली होती, पण दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी नवनीतचा गुडमॉर्निंगचा मेसेज आला. त्याला रिप्लाय करून सीमा ऑफिसात निघून गेली.

सायंकाळी घरी येऊन, चहा घेऊन तिनं सहज टीव्ही लावला तेवढ्यात नवनीतचा मेसेज, ‘‘काय करतेस?’’

‘‘मी टीव्ही बघतेय, तू काय करतो आहेस?’’

‘‘तुझी वाट बघतोय.’’

सीमाला हसायला आलं…असं का करतोय हा? तिनंही मेसेज टाकला, ‘‘पण कुठं?’’

‘‘जिथं तू आहेस तिथंच!’’

‘‘नक्की तूच आहेस ना? तुझा फोटो पाठव. मला खात्री करून घ्यायचीय.’’

‘‘मी उद्या पाठवतो. तू तुझा फोटो पाठव.’’ सीमानं एक फोटो पाठवला.

ताबडतोब उत्तर आलं, ‘‘कसली मस्त दिसते आहेस.’’

‘‘मस्त नाही. जबाबदार अन् स्मार्ट,’’ सीमानं त्याचं वाक्य दुरूस्त केलं. नवनीत नंतर गप्प होता. दोन दिवस त्याचे मेसेजही आले नाहीत. तिसऱ्या दिवशी गुडमॉर्निंगचा मेसेज बघून सीमानं फोन केला, ‘‘आणि कसं काय? कसा आहेस?’’

‘‘तसाच, तू मला सोडून गेलीस तेव्हा होतो तसाच!’’

‘‘मला नाही वाटत, तुझ्या आयुष्यात तर खूपच बदल झालेत. तू नवरा झाला आहेस, मुलांचा बाबा झाला आहेस,’’ सीमानं म्हटलं.

नवनीतनं खूपच बेजबाबदारपणे म्हटलं ‘‘ ते सगळं सोड गं! तू मला काय बनवशील?’’

‘‘मित्रच ना? मित्र मानेन.’’ पटकन सीमा उत्तरली.

‘‘ते तर आपण आहोतच गं!’’ एवढं बोलून त्यानं हृदयाचं चित्र पाठवलं.

‘‘चल, मी बंद करते मला स्वयंपाक करायचाय.’’

सीमा फोन बंद करणार तेवढ्यात त्यानं म्हटलं, ‘‘अगं ऐक, काही दिवसांनी मी दिल्लीत येतोय.’’

‘‘ठीकाय, आलास की कळव.’’

‘‘काय काय खायला घालशील? कुठं कुठं फिरवशील?’’

‘‘जे तुला हवं असेल ते.’’

‘‘मला तर तू हवी आहेस.’’

त्याच्या बोलण्याच्या टोनमुळे सीमा दचकली. मग म्हणाली, ‘‘खरंच? पण पूर्वी कधी बोलला नाहीत तू?’’

‘‘कारण ऑलरेडी तुला समजलेलं होतं.’’

‘‘होय खरंय ते. शंभर टक्के खरंय. मला समजलं होतं.’’

‘‘तर मग तू का नाही बोललीस?’’ नवनीतनं उलट प्रश्न केला. सीमानं अगदी निर्लिप्तपणे सांगितलं, ‘‘कारण तुलाही समजलेलं होतंच.’’

‘‘आता तू कशी राहतेस?’’

‘‘कशी म्हणजे?’’

‘‘म्हणजे थंडीत.’’

नवनीतचा हा प्रश्न सीमाला विचित्र वाटला. तिनं विचारलं, ‘‘तुमच्याकडे थंडी नसते का?’’

‘‘माझ्याकडे थंडी पळवून लावण्याचा उपाय आहे ना. तुझी थंडी कशी पळवून लावतेस? ’’ त्याचा प्रश्न, त्याची विचारण्याची पद्धत, त्यामागचा किळसपणा, सूचकपणा सगळंच ओंगळ वाटलं सीमाला. ‘‘शी: काहीही काय बोलतोस?’’ तिनं आपला राग व्यक्त केला. पण नवनीतचा टोन कायमच होता. तसाच निर्लज्जपणे म्हणाला, ‘‘हे सगळं आधीच बोलून घेतलं असतं तर आजचा दिवस वेगळाच असता.’’

‘‘ते जुनं विसर आता. तू आता विवाहित आहेस. पत्नी आहे तुला.’’

‘‘ती तिच्या जागी, तू तुझ्या जागी. तू म्हणशील तेव्हा तुझ्याजवळ येऊ शकतो.’’ नवनीतनं म्हटलं.

सीमाला नवनीतची ही भाषा खूपच खटकली. स्वत:च्या पत्नीविषयी आदर, मान, प्रेम काहीच नव्हतं का त्याच्या मनांत? नवनीत इतक्या हलक्या भाषेत बोलू शकतो हे त्यावेळी कळलं नव्हतं. हे असं इतकं उघड आमंत्रण? त्यावेळी त्याबद्दल कोमल भावना मनात होत्या. पण याक्षणी आता मनांत थोडा तिरस्कार अन् दुरावाच जाणवू लागला होता. तिनं फोन बंदच केला.

दोन तासही झाले नसतील पुन्हा नवनीतचा मेसेज आला, ‘‘कशी आहेस?’’

सीमानं मेसेज टाकला, ‘‘हे काय चाललंय? मी चांगली आहे.’’

‘‘रात्र कशी घालवतेस?’’ नवनीतचा पुढचा प्रश्न.

सीमाला असल्या विचित्र प्रश्नाची अपेक्षा नव्हती. तिनं संक्षिप्त उत्तर दिलं,

‘‘झोपून.’’

‘‘झोप येते?’’

हा प्रश्न सीमाला आवडला नाही. तरीही टाइप केले. ‘‘हो, अगदी छान गाढ झोप लागते.’’

‘‘आणि जेव्हा…’’ नवनीतनं असं काही अश्लील वक्तव्य केलं की सीमाचा पारा चढला. तिनं संतापून फोनवर सांगितलं, ‘‘आय डोंट लाइक सच टाइप ऑफ गॉसिप.’’

‘‘अगं, मला वाटलं मी माझ्या मैत्रिणीशी बोलतोय…सॉरी तू तर एकदम फिलॉसॉफर निघालीस.’’

सीमाला त्याची ही चेष्टाही आवडली नाही. ती कडक शब्दात म्हणाली, ‘‘फोन कॉल किंवा चॅटिंगला माझी ना नाही , पण भाषेची मर्यादा सांभालायलाच हवी.’’

‘‘मैत्रीत काही मर्यादा नसतात गं. मला म्हणायचंय, मैत्रीत, सीमा कशाला हव्यात.’’

‘‘पण मला सीमेतलीच मैत्री आवडते. सीमा किंवा मर्यादा नसलेली मैत्री मला मान्य नाही.’’ सीमा संतापून म्हणाली.

‘‘मी तुला आवडत होतो हे विसरू नकोस सीमा…’’

‘‘आवडत असणं वेगळं पण ती आयुष्यभराची चूक ठरणं मला मान्य नाही. तुझं हे गलिच्छ रूप लक्षात आलं हेही बरं झालं. यापुढे आपली मैत्री नाही.’’ अत्यंत संतापानं बोलून तिनं फोन बंद केला. नवनीतचा नंबर कायमचाच बंद केला. ब्लॉक केला.

आता सीमाला शांत शांत वाटलं. नवनीतला स्वत:च्या आयुष्यातून उणे केल्याचा पश्चातापही वाटला नाही. अल्लड वयात त्याच्यावर प्रेम केलं होतं, तो हवासा वाटत होता पण आता तो बदलला की त्यावेळी सीमालाच त्याची दुसरी बाजू कळली नव्हती?

विरंगुळा

कथा * लता सोनावणे

सकाळचे नऊ वाजले होते. नंदिनीनं नवऱ्याला अन् सोनी, राहुल या मुलांना हाक मारली, ‘‘ब्रेकफास्ट तयार आहे. लवकर या.’’

टेबलवर ब्रेकफास्ट मांडून नंदिनीनं त्यांचे डबे भरायला घेतले. दुपारच्या जेवणाचे डबे बरोबर घेऊनच तिघं सकाळी घराबाहेर पडायची. ती सरळ सायंकाळी परत यायची. बिपिन नाश्ता करता करता पेपर डोळ्याखालून घालत होते. सोनी अन् राहुल आपापल्या मोबाइलमध्ये गर्क होते. या तिघांचं आटोपून ती निघून गेल्यावरच नंदिनी स्वत: ब्रेकफास्ट घेते.

मुलांना मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेलं बघितलं अन् नंदिनीचा पारा चढला, ‘‘जरा हसतबोलत नाश्ता करता येत नाही का? सगळा वेळ घराबाहेर असता, थोडा वेळ तरी तो मोबाइल बाजूला ठेवा ना?’’

बिपिनला तिचा उंच स्वर खटकला. कपाळाला आठ्या घालून म्हणाले, ‘‘का सकाळी सकाळी आरडा ओरडा करतेस? करत असतील काही त्यांच्या कामाचं.’’

नंदिनी पुन्हा करवादली, ‘‘आता तुम्ही तिघंही एकदम सांयकाळी याल. जरा मोबाइल बाजूला ठेवून चवीनं हसत बोलत खायला काय हरकत आहे?’’

बिपिन हसून म्हणाले, ‘‘खरं तर आम्ही शांतपणे खातोय अन् आरडाओरडा तू करते आहेस.’’

मुलांना बापाचं हे वाक्य फारच आवडलं, ‘‘बाबा, काय छान बोललात.’’ मुलांनी एकदम म्हटलं.

नंदिनीनं तिघांचे डबे अन् पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवल्या अन् ती उदास मनानं तिथून बाजूला झाली. आता सायंकाळपर्यंत ती घरात एकटीच होती. सकाळच्या जो थोडा वेळ हे लोक घरात असतात, त्यात नंदिनीशी थोडं बोलावं, तिची विचारपूस करावी असं यांना का वाटत नाही? सायंकाळी थकून येतील, मग टीव्हीसमोर पाय पसरून बसतील. फार तर फोन, लॅपटॉप…जेवतील की झोपले. आपसातला संवादच संपलाय. मुलं लहान असताना घरात कसं चैतन्य असे. पण ती मोठी झाली, मोबाइल, आयफोन वगैरे आले अन् घर अगदी भकास झालं. घरातल्या बाईलाही इतर सदस्यांनी तिच्याशी बोलावं, काही शाब्दिक देवाण घेवाण करावी असं वाटतं हे यांना का कळू नये?

मुलांना अन् नवऱ्याला वाटतं तिनं सोशल नेटवर्किंग करावं, शेजारीपाजारी ओळखी वाढवाव्यात, व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करावेत. पण हे सगळं नंदिनीला आवडत नाही, त्याला ती तरी काय करणार? नवऱ्याला अन् मुलांना फेसबुक मित्रांची सगळी बित्तंबातमी असते. पण घरात आईशी दोन शब्द बोलायला वेळ नसतो.

नंदिनीला फारच उदास वाटलं. तिघंही आपापले टिफिन बॉक्स घेऊन निघून गेले. तिनं स्वत:चा ब्रेकफास्ट उरकला. मोलकरीण येऊन कामं करून गेली. नंदिनीनं अंघोळ आटोपून रोजची जुजबी कामं उरकली.

पूर्वीही ती फार सोशल नव्हती. पण घरातच किती आनंद होता…तीही सतत हसायची. गाणी गुणगुणायची. आता दिवस कंटाळवाणा वाटतो. संध्याकाळ तर अधिकच रटाळ वाटते. उगीचच टीव्हीसमोर बसून वेळ काढायचा.

तिच्या घरातली बाल्कनी ही तिची फार आवडती जागा होती. लखनौहून मुंबईला येऊन तिला एक वर्षच झालं होतं. दादरसारख्या मध्यवस्तीत त्यांना सुंदर फ्लॅट मिळाला होता. मुलांना कॉलेज आणि बिपिनला ऑफिसला जाणंही इथून सोयीचं होतं.

बाल्कनीत तिनं लावलेली रातराणी आता सुरेख वाढली होती. इतरही काही झाडं छान फोफावली होती. हा हिरवागार कोपरा तिला खूप सुखावायचा. इथं तिचं एकटीचं राज्य होतं. इतर कुणी इकडे फिरकत नसे.

तेवढ्यात तिला आठवलं, बरेच दिवसात स्टोअररूममध्ये ती फिरकली नव्हती. ती स्टोअररूममध्ये गेली. थोडी आवराआवरी करताना तिला मुलांच्या खेळण्यांचा कागदी डबा हाती लागला. त्यात एक दुर्बिण किंवा बायनॉक्युलरसारखं खेळणं होतं. नैनीतालला गेले असताना मुलांनी हट्ट करून ते विकत घ्यायला लावलं होतं. आता मुलं मोठी झाल्यावरही ते त्यांच्या सामानात होतंच.

तिनं ती दुर्बिण हातात घेतली अन् गंमत म्हणून ती डोळ्याला लावून बघू लागली…लगेच ती बाल्कनीत आली. झाडांच्या आडोशात स्टुलावर बसून तिनं दुर्बिण फोकस केली अन् डोळ्याला लावून बघायला लागली. थोड्याच अंतरावर एका बिल्डिगचं बांधकाम सुरू होतं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये लोक राहायला आलेले होते. तिनं दुर्बिण थोडी फिरवली. समोरच्या घरातली बाल्कनी अन् त्याला लागून असलेली ड्रॉइंगरूम छान दिसत होती. ड्रॉइंगरूममध्ये एक मध्यमवयीन स्त्री डान्सच्या स्टेप करत कामं उरकत होती. बहुधा गाणं सुरू असावं.

तेवढ्यात तिची तरूण मुलगीही तिथं आली. आता मायलेकी दोघीही डान्स करू लागल्या. नंतर दोघीही खळखळून हसल्या अन् आतल्या खोलीत निघून गेल्या.

त्यांचं ते बिनधास्त नाचणं, खळखळून हसणं यामुळे नंदिनीचाही मूड एकदम छान झाला. तिच्या नकळत ती काही तरी गुणगुणु लागली. मग तिनं दुर्बिण इकडे तिकडे फिरवून पाहिली, पण बहुतेक फ्लॅट्स बंद होते किंवा त्यांचे पडदे ओढलेले होते.

अवचित तिची नजर एका फ्लॅटच्या बाल्कनीत स्थिरावली. ती दचकली. दुर्बिण हातातून पडता पडता वाचली.

एक बळकट, घोटील देहाचा तरूण बाल्कनीत टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत उभा होता. दुसऱ्या टॉवेलनं तो केस पुसत होता. तेवढ्यात त्याची तरूण नवविवाहित सुंदर पत्नी मागून येऊन त्याला बिलगली. वळून त्यानं तिला कवेत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् कंबरेत हात घालून तिला घेऊन तो ड्रॉइंगरूमच्या सोफ्यावर रेळून बसला. दोघंही एकमेकांची चुंबनं घेत होती. ती बेभान होती. बघताना नंदिनीचीही कानशिलं गरम झाली. हृदयाची धडधड वाढली. अंगावर गोड रोमांच उभे राहिले. किती तरी दिवसांनी शरीर अन् मन असं टवटवीत झाल्यासारखं वाटलं. काही क्षणांतच ते जोडपं आतल्या खोलीत निघून गेलं. बहुधा बेडरूममध्ये गेले असावेत, नंदिनीला हसायला आलं.

नंदिनी उठून घरात आली. एक वाजून गेला होता. वेळ इतका भर्रकन गेला होता. छान वाटत होतं. नंदिनी जेवतानाही प्रसन्न होती. तिला आपला लग्नातला शालू आठवला, हिरवा चुडा आठवला. छान नटून थटून बिपिनबरोबर फिरायला जावं असं वाटू लागलं.

जेवण आटोपून ती थोडा वेळ आडवी झाली. छानपैकी डुलकी झाली.

बारीकसारीक कामं आटोपून तिनं चहा केला. चहाचा कप अन् दुर्बिण घेऊन ती पुन्हा बाल्कनीत येऊन बसली. मायलेकींच्या घरात तर शांतता होती पण नवविवाहित जोडप्याची मात्र लगबग सुरू होती. खूप हौसेनं अन् उत्साहानं ती दोघं घर लावत होती. नवं लग्न, नवा संसार, नवं घर मांडताना त्यांचा प्रणयही रंगत होता. जोडी फारच छान होती.

नंदिनीनं हसून तिच्या बायनाक्युलरचा मुका घेतला. आज तिला एक नवीनच उत्साह वाटत होता. सगळा दिवस किती आनंदात गेला होता. गंमत म्हणजे आज तिला नवऱ्याचा किंवा मुलांचा राग आला नाही. कुठल्या जुन्या दुखवणाऱ्या घटना आठवल्या नाहीत. एकदम प्रसन्न होतं मन.

पाच वाजले. रोज सायंकाळी नंदिनी तासभर फिरायला जाते. तिनं कुठलंसं गाणं गुणगुणत स्वत:चं आवरलं अन् ती फिरायला निघाली. आज तिची चालही झपाझप होती. आपली ही दुर्बिणीची गंमत कुणालाही सांगायची नाही हे तिनं मनोमन ठरवलं होतं.

खरं तर असं चोरून बघणं बरोबर नाही, पण आजचा दिवस किती छान गेला. जाऊ दे, उगीच काय चूक काय बरोबर याचा विचार करायचाच नाही. ती फिरून आली आणि तिनं सर्वांसाठी संध्याकाळचा नाश्ता तयार केला. घरातली मंडळी येण्यापूर्वीच तिनं तिचं खेळणं कपाटात लपवून ठेवलं.

सायंकाळी घरी आलेल्या लोकांचा चहा फराळ आटोपून ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. अधूनमधून मुलांशी कॉलेजबद्दल बोलत होती. फोनवर गर्क असलेल्या राहुलला तिनं काहीतरी विचारलं, तसा एकदम तो खेकसला, ‘‘किती प्रश्न करतेस गं आई?’’

नंदिनीला आज त्याचा अजिबात राग आला नाही की वाईटही वाटलं नाही. तिला स्वत:लाच या गोष्टींचं नवल वाटलं. ती मजेत गाणं गुणगुणत काम करत होती.

जेवण झाल्यावर मुलं आपापल्या खोल्यांमधून गेली अन् बिपिन न्यूज बघू लागले. नंदिनीला वाटलं आपण आपली दुर्बिण घेऊन बाल्कनीत बसावं का? पण नकोच. घरात कुणाला काहीच कळायला नकोय. मग तिनं अत्यंत रोमँटिक पद्धतीनं बिपिनच्या गळ्यात हात घातले अन् विचारलं, ‘‘बाहेर थोडे पाय मोकळे करून येऊयात का?’’

बिपिन एकदम दचकलाच! तिच्याकडे लक्षपूर्वक बघत त्यानं विचारलं, ‘‘तुला काय झालंय?’’

हसून नंदिनीनं म्हटलं, ‘‘फक्त एवढंच नेहमी विचारता…दुसरं काही तरी बोला ना?’’

बिपिनलाही हसायला आलं. त्यांनी टीव्ही बंद केला. दोघं फिरून आली. नंदिनीचा मूड फारच छान होता. त्या नवविवाहित जोडप्याच्या प्रणयलीला आठवून ती ही उत्तेजित झाली होती. त्या रात्री कितीतरी दिवसांनी तिनं बिपिनच्या प्रेमाला मनापासून प्रतिसाद दिला.

सकाळी घरातली तिन्ही माणसं बाहेर जाताच नंदिनी ‘खेळणं’ घेऊन स्टुलावर येऊन बसली. मायलेकींच्या फ्लॅटमधली आई बहुधा नोकरी करत असावी. ती साडी नेसून तयार होती. मुलगी कॉलेजमधली असावी. दोघीही आपापलं आवरून एकत्रच बाहेर पडल्या. घरात इतर कुणी नसावं. काल बहुधा त्यांनी रजा घेतली असावी, तरीच नाचगाणं करू शकल्या. आत्ताही दोघी एकदम आनंदात अन् टवटवीत दिसत होत्या.

मग नंदिनीनं दुर्बिण दुसऱ्या फ्लॅटकडे वळवली, बघूयात राघूमैना काय करताहेत? तिला स्वत:च्या विचारांची गंमत वाटून ती मोठ्यानं हसली. राघू ऑफिससाठी तयार झाला होता. मैना त्याला स्वत:च्या हातानं सँडविच भरवत होती. व्वा! काय छान रोमांस चाललाय…खरंय, हेच दिवस असतात आयुष्य उपभोगायचे. नव्या नवलाईचे हे नऊ दिवस संपले की रटाळ आयुष्य सुरू होतं. तिला पुन्हा हसायला आलं. तेवढ्यात मोलकरीण आली. चपळाईनं नंदिनीनं दुर्बिण लपवली.

कितीतरी वर्षांनी नंदिनीनं बिपिनला मेसेज केला. ‘आय लव्ह यू’ बिपिननं आश्चर्य व्यक्त करणारी स्माइली पाठवत उत्तर दिलं, ‘आय लव्ह यू, डियर.’ नंदिनी अगदी वेगळ्याच मूडमध्ये घरातली कामं आवरत होती. दुपारी ती ब्यूटीपार्लरला गेली. फेशियल, मेनिक्योर, पॅडीक्योर, छानसा मॉडर्न हेअरकट करून घेतल्यावर आरशात स्वत:चं रूप बघून एकदम खुष झाली. तिथून ती मॉलमध्ये गेली. स्वत:साठी सुंदर कुर्ता विकत घेतला.

घरी परत येताच दुर्बिण उचलून बाल्कनी गाठली. मायलेकी बहुधा एकदम सायंकाळीच परतत असाव्यात. नवी नवरी एकदा ओझरती तिच्या बाल्कनीत दिसली अन् मग एकदम संध्याकाळी छान नटून थटून नवऱ्याची वाट बघत बाल्कनीत उभी होती. नंदिनीही आज एकदम वेगळ्याच पद्धतीने तयार झाली.

सायंकाळी सोनी, राहुल घरी परतले अन् नंदिनीला बघून सोनीनं म्हटलं, ‘‘व्वा, आई, किती छान दिसते आहेस. हा नवा हेअरकट खूप शोभून दिसतो आहे तुला.’’

राहुलनंही हसऱ्या चेहऱ्यानं म्हटलं, ‘‘अशीच राहत जा आई, लुकिंग गुड!’’

बिपिन घरी आले. ते तर कालपासूनच नंदिनीत झालेल्या बदलामुळे चकित झाले होते. वरपासून खालपर्यंत तिच्याकडे बघितल्यावर म्हणाले, ‘‘व्वा! फारच छान! काय, काही खास बेत आहे का?’’

नंदिनीनं हसून म्हटलं, ‘‘वाटलं तर तसं समजा.’’

‘‘चला तर, आजच्या या मेकओव्हर प्रित्यर्थ आपण आईस्क्रिम खाऊयात. रात्रीच्या जेवणानंतर ‘कूल कॅम्प’ला जाऊ.’’ बिपिननं म्हटलं, तशी दोघं ही मुलं आनंदानं चित्कारली.

‘‘व्वा! बाबा, किती मज्जा.’’

चौघंही आनंदात आईस्क्रीम खाऊन गप्पा मारत घरी पोहोचले. नंदिनीला स्वत:चंच आश्चर्य वाटत होतं. गेले दोन दिवस तिला कशाचाही राग आला नव्हता. सगळंच छान वाटत होतं. ती आनंदात असल्यामुळे घरातलंही वातावरण मोकळं आणि आनंदी होतं…म्हणजे, तिच्या तक्रारी व चिडचिडीमुळे घरातलं वातावरण बिघडतं? स्वत:च्या आयुष्यात आलेल्या नीरसपणाला ती स्वत:च जबाबदार होती का?

रिकामपण तिच्याजवळ होतं. इतरांना त्यांचे व्याप होते. त्या रिकामपणामुळे ती चिडचिडी बनली होती, आपला वेळ अन् एनर्जी तिघांबद्दल तक्रारी करण्यात खर्च करत होती. खरं तर आनंदी राहण्यासाठी तिनं कुणावर अवलंबून का असावं?

आता नंदिनीचं हेच रूटीन झालं. आपली बाल्कनी ती अधिक छान ठेवू लागली. रातराणी, मोगऱ्याच्या सुवासात, फांद्या अन् पानांच्या आडोशाच्या आधारानं स्टुलावर बसून दुर्बिण डोळ्याला लावायची अन् समोरच्या घरातली मजा बघायची. त्या हिरोहिरोइनच्या मादक प्रणयाची ती अबोल साक्षीदार होती. त्यांच्यामुळेच तिला स्वत:चे लग्न झाल्यानंतरचे प्रेमाचे दिवस आठवले. ती अन् बिपिन तेव्हा याच वयाचे होते.marathi-storyत्या दिवसांचा ताजेपणा आता तिला नव्यानं जाणवत होता. बिपिन टूरवर गेले तरी ती आता चिडचिड करत नव्हती. कधी मुलीबरोबर सिनेमा बघून यायची, कधी दोन्ही मुलांबरोबर त्यांच्या सोयीनुसार लंच किंवा डिनरला जायची. स्वत:च्या राहणीबद्दल अधिक सजग झाली होती. दैनंदिन कामाच्या जोडीनं व्यायमावरही लक्ष देत होती.

मायलेंकीच्या फ्लॅटमधल्या त्या दोघीही घाई गडबडीच्या आयुष्यात कायम आनंदी दिसायच्या. त्यांचा आनंद तिला सुखावत होता. ती मनातल्या मनात अंदाज बांधायची. या दोघीच का राहतात? यांच्या घरात अजून कुणी का नाही? आई विधवा असेल की घटस्फोटिता? मुलगी विवाहित आहे की अविवाहित? नंदिनीचा दिवस लवकर संपायचा. शिवाय, दुर्बिण लपवून ठेवणं आपलं गुपित आपल्यापुरंतच ठेवणं हीसुद्धा एक मज्जाच होती.

समोरच्या बिल्डिंगमधले इतर फ्लॅट्सही आता भरायला लागले होते. तिथली वस्ती वाढत होती. दुर्बिणीचा खेळ सुरू होऊन आता जवळपास सहा महिने लोटले होते. हिरोहिरोइनच्या रोमांसने तर तिच्या आयुष्यात नवं चैतन्य निर्माण केलं होतं. ती किती बदलली होती.

नेहमीप्रमाणे तिनं सकाळी आपली जागा धरून, बाल्कनीत बसून दुर्बिण डोळ्याला लावली अन् तिला धक्काच बसला. तिच्या हाताला कंप सुटला. स्वप्नांच्या जगातून वास्तवाच्या जमिनीवर दाणकन् आदळावं असं झालं. तिचे हिरोहिरोईन फ्लॅट रिकामा करण्याच्या लगबगीत होते. खाली रस्त्यावर ट्रकही उभा दिसला. हिरोनं पॅकर्स बोलावले होते. त्यांची लगबग दिसत होती.

हे काय झालं? नंदिनीला खूपच वाईट वाटलं. स्वत:च्या नकळत की किती गुंतली होती त्यांच्यात? त्यांना तर कल्पनाही नव्हती की त्यांच्यामुळेच एका कुटुंबात किती आनंद निर्माण झाला होता. त्या कुटुंबातली गृहिणी किती बदलली होती…आता पुन्हा तेच उदासपण…बोअर रूटीन…दिवसभर नंदिनी अस्वस्थ होती. बाल्कनीतून घरात फेऱ्या मारत होती.

सायंकाळ होता होता ट्रक भरून निघून गेला. हिरोहिरोइन त्यांच्या कारमधून निघून गेली. मांडीवर दुर्बिण ठेवून नंदिनीनं भिंतीला डोकं टेकवलं. कितीतरी वेळ ती तशीच बसून होती.

संध्याकाळी तिचा उतरलेला, मलूल चेहरा सगळ्यांच्याच काळजीचा विषय झाला.

पण, ‘‘जरा बरं वाटत नाहीए,’’ म्हणून तिनं पटकन् खोली गाठली अन् ती अंथरूणावर पडली. त्यानंतरचे चार पाच दिवस खूपच उदास वाटत होतं. नाही म्हणायला त्या आठवड्यात मायलेकींनी दोन दिवस रजा घेतली असावी. त्यांच्या घरात थोडा उत्साह होता. पण नंदिनीची कळी फारशी खुलली नाही.

मात्र एक दिवस स्टुलावर बसून नंदिनी दुर्बिणीतून उगीचच इकडे तिकडे बघत असताना अचानक त्या हिरोवाल्या घरात गडबड जाणवली. तीन चार तरूण मुलांनी तो फ्लॅट बहुधा भाड्यानं घेतला होता.

ती तरूण देखणी मुलं घर लावण्यात मग्न होती. एक जण पडदे लावत होता. दुसरा बहुधा डस्टिंग करत होता, पांढरा टी शर्ट आणि काळी शॉर्ट घातलेला एक जण बाल्कनीत कपडे वाळायला घालत होता. त्याच्या शेजारच्या बाल्कनीत एक तरूण मुलगी कुंड्यांना पाणी घालत होती. पाणी घालताना तिचं लक्ष पुन्हा:पुन्हा बाल्कनीतल्या त्या तरूणाकडे जात होतं.

नंदिनीला हसू फुटलं. ती लक्षपूर्वक पाहत होती. तो मुलगाही त्या मुलीकडे बघून हसला अन् ती मुलगी लाजली. अरेच्चा! इथं तर लव्हस्टोरी सुरू झालीय की! दोघं एकमेकांकडे बघून हसताहेत…मजा येईल आता. शिफ्टिंग झाल्या झाल्याच रोमांसही सुरू झाला.

तेवढ्यात एक वयस्कर स्त्री बाल्कनीत येऊन त्या मुलीला काही म्हणाली. ती बहुधा त्या तरूणीची आजी असावी. मुलीनं लगेच मुलाकडे पाठ केली. मुलगाही लगेच बाल्कनीतून घरात गेला. आजीनं कुंड्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं. मग तीही आत गेली. किती तरी दिवसांनी गाणं गुणगुणत नंदिनी बाल्कनीतून उठली अन् तिनं दुर्बिण कपाटात लपवून ठेवली. आज तिला पुन्हा उत्साही वाटत

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें