मतपरिवर्तन

कथा * शन्नो श्रीवास्तव

या नव्या कॉलनीत येऊनही मला खरं तर बरेच दिवस झाले होते. पण वेळ मिळत नसल्यानं माझं कुणाकडे जाणं, येणं होत नसे. मुळात ओळखीच झाल्या नव्हत्या. मी शाळेत शिक्षिका होते. सकाळी आठला मला घर सोडावं लागायचं. परतून येईतो तीन वाजून जायचे. आल्यावर थोडी विश्रांती, त्यानंतर घरकाम, कधी बाजारहाट वगैरे करत दिवस संपायचा. कुणाकडे कधी जाणार?

माझ्या घरापासून जवळच अवंतिकाचं घर होतं. तिची मुलगी योगिता माझ्याच शाळेत, माझीच विद्यार्थिनी होती. मुलीला सोडायला ती बसस्टॉपवर यायची. तिच्याशी थोडं बोलणं व्हायचं. हळूहळू आमची ओळख वाढली. मैत्री म्हणता येईल अशा वळणावर आम्ही आलो. सायंकाळी अवंतिका कधीतरी माझ्या घरी येऊ लागली. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या.

तिचं बोलणं छान होतं. राहणी टापटीप होती. तिचे कपडे, दागिने, राहाणीमान यावरून ती श्रीमंत असावी असा माझा कयास होता. नव्या जागी एक मैत्रीण भेटल्यामुळे मलाही बरं वाटत होतं.

योगिता अभ्यासात तशी बरी होती पण तिचा होमवर्क कधीच पूर्ण झालेला नसे. अगदी सुरुवातीला मी तिला एकदा रागावले की होमवर्क पूर्ण का केला नाही, तेव्हा ती रडवेली होऊन म्हणाली, ‘‘बाबा मम्मीला रागावले, ओरडले म्हणून मम्मी रडत होती. माझा अभ्यास घेतलाच नाही.’’

नंतरही तिचा होमवर्क पूर्ण झालेला नसायचा अन् कारण विचारल्यावर ती नेहमीच आईबाबांच्या भांडणाबद्दल सांगायची. अर्थात्च एक टीचर म्हणून कुणाच्याही घरगुती बाबतीत मी नाक खुपसणं बरोबर नव्हतं. पण पुढे जेव्हा आमची मैत्री झाली अन् योगिताच्या अभ्यासाचा प्रश्न असल्यामुळे मी एकदा अंवतिका घरी आलेली असताना तिला याबद्दल विचारलं. तिनं डोळ्यांत पाणी आणून मला सांगितलं, ‘‘घरातल्या अशा गोष्टी बाहेर कुणाजवळ बोलू नयेत हे मला समजतं. पण आता तुम्हाला आमच्या भांडणाबद्दल समजलंच आहे तर मी ही तुमच्याशी बोलून माझ्या मनावरचा ताण कमी करून घेते. खरं तर माझ्या नवऱ्याचा स्वभावच वाईट आहे. ते सतत माझे दोष हुडकून माझ्यावर खेकसत असतात. कितीही प्रयत्न केला तरी हे खूश होत नाहीत. त्यांच्या मते मी मूर्ख अन् गावंढळ आहे. तुम्हीच सांगा, मी वाटते का मूर्ख अन् गावंढळ? मी थकलेय या रोजच्या भांडणांनी…पण सहन करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीए माझ्याजवळ.’’

‘‘मी खरं म्हणजे तुमच्या पतींना भेटलेय दोन चारदा बसस्टॉपवर. त्यांना बघून ते असे असतील असं वाटत नाही.’’

‘‘दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. खरं काय ते जवळ राहणाऱ्यालाच माहीत असतं.’’ ती म्हणाली.

भांडणाचा विषय टाळत मी म्हटलं, ‘‘तुम्ही बोलत होता की तुमचा नवरा बरेचदा ऑफिसच्या कामानं बाहेरगावी जातो. अशावेळी तरी तुम्ही योगिताच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हरकत नाही. कारण घरात तुम्ही दोघीच असता.’’

‘‘मी एकटीनंच का म्हणून लक्ष द्यायचं? मुलगी माझी एकटीची नाही. त्यांचीही आहे. त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव नको का? समजा नाही घेतला तिचा अभ्यास तर निदान सतत खुसपटं काढून माझं डोकं तडकवू नका. मला, तर खरंच असं वाटतं की त्यांनी टूरवरच राहावं. घरी राहूच नये.’’

तिचं बोलणं ऐकून माझं तिच्या नवऱ्याबद्दलचं मत खूपच वाईट झालं. दिसायला तर तो सज्जन, शालीन वाटतो. मोठ्या पोस्टवर आहे म्हणजे शिकलेला असणारच. असा माणूस घरात, आपल्या बायकोशी वाईट वागतो म्हणजे काय? मला त्याचा राग आला.

आता अवंतिका मला तिच्या घरातल्या, आयुष्यातल्या गोष्टी विनासंकोच सांगू लागली. ते ऐकून मला तिच्याविषयी सहानुभूति वाटायची. माझ्या मनात यायचं एका चांगल्या मुलीचं आयुष्य चांगला नवरा न भेटल्यामुळे उगीचच नासतंय. पूवी जेव्हा केव्हा अवंतिकाऐवजी तिचा नवरा योगिताला सोडायला यायचा तेव्हा मी त्याच्याशी बोलायची, पण आता त्यांचं हे रूप कळल्यावर मी त्याला टाळायलाच लागले. जो माणूस पत्नीचा मान ठेवू शकत नाही, तो इतर स्त्रियांना काय मान देणार?

एक दिवस अवंतिका खूपच वाईट मूडमध्ये माझ्या घरी आली. रडत रडतच म्हणाली, ‘‘योगिताच्या स्कूल ट्रिपचे दोन हजार रुपये तुम्ही तुमच्याकडून भरु शकाल का? माझा नवरा टूरवरून परत आला की मी तुमचे पैसे परत करते.’’

मीच योगिताची क्लास टीचर असल्यामुळे मला स्कूल ट्रिपबद्दल माहिती होती. ‘‘मी भरते पैसे’’ मी तिला आश्वस्त केलं. पण तरीही मी विचारलंच की तिला कुणा दुसऱ्याकडून पैसे घेण्याची वेळ का आली?

अवंतिकाचा बांध फुटला जणू. ‘‘काय सांगू तुम्हाला? कसं आयुष्य काढतेय मी या नवऱ्याबरोबर माझं मला ठाऊक. मला भिकाऱ्यासारखं जगावं लागतंय. मला एक एटीएम अकाउंट उघडून द्या म्हटलं तर ऐकत नाहीत. माझ्याकडे कार्ड असलं तर मला अडीअडचणीला पैसे कुणाकडे मागावे लागणार नाहीत. एवढंही त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं मी वायफळ खर्च करेन. अहो काय सांगू? बाहेरगावी जाताना मला पुरेसे पैसेही देऊन जात नाहीत. आता बघाना, दोन दिवसांच्या टूरवर गेलेत. काल मला एक सूट आवडला तर मी तो विकत घेतला. तीन हजार तर तिथंच संपले. हजार रुपये ब्यूटीपार्लरचे झाले. काल मला स्वयंपाकाचा कंटाळा आला होता म्हणून हॉटेलमधून पिझ्झा मागवला. त्याचे झाले सहाशे रुपये. म्हणजे आता माझ्या हातात फक्त चारशे रूपये उरलेत. शाळेत दोन हजार कुठून भरू? माझ्यापुढे दोनच पर्याय उरलेत एक तर लेकीला सांगायचं, घरी बैस, मुकाट्यानं…शाळेच्या ट्रिपबरोबर जायचं नाही किंवा कुणाकडे तरी हात पसरायचे. लेकीचा उतरलेला चेहरा बघवेना म्हणून शेवटी तुमच्याकडे आले पैसे मागायला.’’

अवंतिकाचा धबधबा थांबला तेव्हा मी विचारात पडले की शाळेच्या ट्रिपचे पैसे बरेच आधी सांगितले होते. पाच हजार रुपये हातात असताना तीन हजाराचा स्वत:चा ड्रेस आणि हजार रुपये ब्यूटीपार्लरवर खर्च करायची गरजच काय होती? दोन हजार रुपये ट्रिपचे भरून झाल्यावर मग इतर खर्चासाठी बाकीचे पैसे ठेवायचे. दोघीच जणी घरात होत्या. योगिताच्या आवडीचा एखादा पदार्थ घरीच केला असता तर पिझ्झाचे सहाशे रुपयेही वाचवता आले असते. कुठलीही जबाबदार गृहिणी, पत्नी किंवा आई स्वत:च्या ड्रेसवर किंवा पार्लरवर असा खर्च करत नाही, करायलाही नको. कदाचित अवंतिकाची ही सवय ठाऊक असल्यामुळेही तिचा नवरा एटीएम तिला उघडून देत नसेल. असो, मी योगिताचे ट्रिपचे पैसे भरले. यथावकाश अवंतिकानं मला माझे पैसे परतही केले. तो विषय तिथेच संपला.

मध्यंतरी काही महिने उलटले. शाळेला ओळीनं तीन दिवसांची सुट्टी होती. त्यामुळे मला बऱ्यापैकी वेळ मोकळा मिळाला होता. अवंतिका नेहमी मला तिच्या घरी बोलवायची पण मला जमत नव्हतं. मी विचार केला या निमित्तानं आपण अवंतिकाच्या घरी एकदा जाऊन यावं. मी तिला तिच्या सोयीची वेळ विचारून घेतली अन् त्या प्रमाणे अमूक दिवशी, अमूक वेळेला तिच्याकडे पोहोचतोय हे फोन करून कळवलं.

मी तिच्या घरी पोहोचले तेव्हा आतून जोरजोरात भांडणाचे आवाज येत होते. डोअरबेल वाजवण्यासाठी उचललेला माझा हात आपोआप खाली आला. तिच्या नवऱ्याचा आवाज ऐकू आला, ‘‘किती वेळा सांगितलंय तुला की माझी सूटकेस नीट पॅक करत जा. पण तू कधीही ते काम नीट करत नाहीस. यावेळी माझी बनियान अन् शेव्हिंग क्रीम ठेवलं नव्हतं. अगं, जिथं आम्हाला थांबवलं होतं ते गेस्ट हाऊस शहरापासून किती लांब होतं तुला कल्पना नाहीए, किती त्रास झाला मला.’’

‘‘हे बघा माझ्यावर ओरडू नका. तुम्हाला माझं काम पसंत पडत नाही तर स्वत:च भरून घेत जा ना आपली बॅग, मला कशाला सांगता?’’

‘‘नेहमी मीच माझी बॅग भरतो ना? पण कधी कधी ऑफिसातून ऐनवेळी टूरवर जाण्याची सूचना होते, अशावेळी घरी येऊन बॅग भरायला वेळ तरी असतो का? तरीही मी तुला तीन तास आधी सूचना दिली होती.’’

‘‘तुमचा फोन आला तेव्हा मी चेहऱ्याला पॅक लावला होता. तो वाळेपर्यंत मी काम करू शकत नव्हते. थोडी आडवी झाले तर मला झोपच लागली. त्यानंतर आलाच की तो तुमचा शिपाई बॅग घ्यायला. घाईत राहिलं काही सामान तर एवढे ओरडताय कशाला?’’

‘‘अगं, पण असं अनेकदा झालंय. बिना बनियान घालता शर्ट घालावे लागले. कलीगकडून शेव्हिंग मागून दाढी करावी लागली. यात तुला काहीच गैर वाटत नाहीए? निदान ‘चुकले, सॉरी’ एवढं तरी म्हणता येतं.’’

‘‘का म्हणायचं मी सॉरी? तुम्हाला तर सतत अशी खुसपटंच काढायला आवडतात. एवढंच आहे तर आणा ना दुसरी कुणी जी तुमची सेवा करेल.’’

अवंतिकाची शिरजोरी बघून मी चकितच झाले. टूरवर नवऱ्याला आपल्या चुकीमुळे त्रास झाला याची तिला अजिबात खंत नव्हती. उलट ती वाद घालत होती. मला तिचं हे वागणं खटकलं. आल्यापावली परत जावं म्हणून मी माघारी वळणार तेवढ्यात आतून अवंतिकाचा नवराच दार उघडून बाहेर आला.

मला बघताच तो एकदम गडबडला, ‘‘मॅम, तुम्ही? बाहेर का उभ्या आहात? या ना आत या.’’ त्यानं मला बाजूला सरून आत यायला वाट करून दिली.

‘‘अगं अवंतिका, मॅडम आल्या आहेत.’’ त्यानं तिलाही आत वर्दी दिली.

मला बघताच अवंतिका आनंदली. नवऱ्याच्या चेहऱ्यावर ओशाळलेपणा होता, पण अवंतिकाच्या चेहऱ्यावर त्याचा मागमूसही नव्हता.

अवंतिकाच्या घरातला पसारा बघून मी हादरेलच. आधीच त्यांचं भांडण ऐकून मन खिन्न झालं होतं. त्यातून ते अस्ताव्यस्त घर बघून तर माझं मन विटलंच. स्वत: अवंतिका कायम चांगले कपडे, मेकअप, व्यवस्थित केस, नेलपेण्ट अशी टेचात असते. पण घर मात्र कमालीचं गचाळ होतं. हॉलमधला सोफा सेट महागाचा होता पण त्यावर मळक्या कपड्यांचा ढीग होता. डायनिंग टेबलवर खरकटी भांडी अन् कंगवा, तेलाची बाटलीही पडून होती. आतून बेडरूममधला पसाराही दिसतच होता. मी मुकाट्यानं कपडे बाजूला सरकवून स्वत:ला बसण्यापुरती जागा करून घेतली.

‘‘मॅम, तुम्ही घरी येणार हे कळल्यावर योगिता खूपच खुश आहे. आत्ता ती मैत्रिणीबरोबर खेळायला गेली आहे. येईल थोड्यावेळात,’’ अवंतिकानं म्हटलं. ती पाणी आणायला आत गेली. तिचा नवरा म्हणाला, ‘‘तुला माहित होतं ना की मॅम येणार आहेत. तरी घर इतकं घाण ठेवलंस? काय वाटेल त्यांना?’’

‘‘त्या कुणी परक्या थोडीच आहेत? त्यांना काही वाटणार नाही. तुम्ही पटकन् मला चहापत्ती अन् खायला काहीतरी आणून द्या.’’ तिनं नवऱ्याला घराबाहेर पिटाळलंच.

अवंतिकाकडे मला धक्क्यावर धक्के बसत होते. तिची घराबाहेरची राहणी, वागणूक अन् घरातला पसारा, नवऱ्याशी भांडण करणं, याचा कुठेच मेळ बसत नव्हता. तीन दिवसांपूर्वीच तिनं माझ्याकडून डबाभर चहापत्ती नेली होती. ती संपलेली चहा पूड अजूनही घरात आली नव्हती. सतत ती मला बोलवायची. म्हणून अगदी ठरवून पूर्वसूचना देऊन मी घरी आले तर घरात ही परिस्थिती.

एकटीनं बाहेर बसण्यापेक्षा तिच्यासोबत स्वयंपाकघरात गप्पा माराव्यात म्हणून मी आत गेले अन् तिथला खरकटवाडा बघून, वास मारणारं सिंक बघून उलट्यापावली परत फिरले.

माझं मत आता बदललं होतं. अवंतिकाला फक्त नटायला, भटकायला, बाहेर खायला आवडत होतं. घरातली जबाबदारी अजिबात नको होती. नवऱ्याविरूद्ध गरळ ओकून ती लोकांकडून सहानुभूती मिळवत होती. नवऱ्यानं दिलेले पैसे नको तिथं उधळून पुन्हा नवरा पैसे देत नाही म्हणून रडत होती. कष्ट करून पैसे मिळवणाऱ्या नवऱ्यालाच दोष देत होती. त्याच्या सुखसोयीचा विचारही तिच्या मनात येत नव्हता.

घाणेरड्या कपातला चहा कसाबसा संपवून मी पटकन् तिथून उठले. आता माझं मत परिवर्तन झालं होतं. अवंतिकाचं खरं रूप माझ्यासमोर आलं होतं.

अवंतिकाचा नवरा खरोखर सज्जन होता. त्याला चांगल्या गोष्टींची आवड होती म्हणूनच घरात असे महागडे सोफे व इतर फर्निचर अन् महागाचे पडदे व सुंदर शोपीसेस होते. एवढा खर्च त्यानं केल्यावर घर स्वच्छ व चांगलं, व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी अर्थात्च अवंतिकाची होती. पण तिला मुळातच या गोष्टींचा कंटाळा असल्यामुळे त्या दोघांची भांडणं होत असावीत. अवंतिकाला नोकरीची दगदग नको होती. म्हणून तिनं हाउसवाइफचा पर्याय निवडला होता, पण तेवढंही काम करणं तिला अवघड होत होतं.

उच्चपदावर काम करणाऱ्या, त्यासाठी भरपूर पगार घेणाऱ्या पुरुषांना नोकरीत अनेक ताणतणाव असतात. अशावेळी घरी परतून आल्यावर स्वच्छ घर, हसऱ्या चेहऱ्याची बायको अन् आपुलकीचे दोन शब्द त्यांना हवे असतात. पण अवंतिकाच्या घरात स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यवस्थिपणा अन् प्रेमाच्या शब्दांचाही अभावच होता. तिच्या नवऱ्याला तिचं वागणं अन् एकूणच कामाची पद्धत आवडत नव्हती यात नवल काय? एवढं करून ती त्यालाच दोष देत होती. वाईट ठरवत होती. मीच नाही का तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिच्या नवऱ्याविषयी वाईट मत करून घेतलं होतं? मलाही वाटलं होतं की हा माणूस बायकोचा मान ठेवत नाही. तिला पैसे देत नाही, घराकडे लक्ष देत नाही.

परिस्थिती उलटी होती. तो माणूस सज्जन होता. बायको, मुलीसाठी भरपूर पैसा खर्च करत होता. पण त्याला सुख नव्हतंच. माद्ब्रां मतपरिवर्तन झालं होतं. आता माझ्या मनात अवंतिकाविषयी राग होता अन् तिच्या नवऱ्याविषयी आदर.

नातं तेच, स्वरूप नवं

कथा * मोनिका अग्रवाल

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आज सायंकाळी आम्ही दोघं गरमागरम चहाचे घोट घेत गप्पा मारत आहोत. आज लोकांच्या दृष्टीनं आम्ही आदर्श नवराबायको आहोत. आमचं एकमेकांवर खरोखर खूप प्रेम आहे. पण मधल्या काळातली परिस्थिती खूपच वेगळी होती. त्यावेळी आमचं नातं पार धुरकटलं होतं. काळजी अन् धुराचे ठसके…सगळंच असह्य झालं होतं.

दोन वर्षं कोर्टात केस चालली होती. नवरा-बायकोच्या घटस्फोटाचा खटला होता. घटस्फोटाची कारणं खरं तर अगदीच फुसकी होती. घरात घडलेल्या एका अगदीच किरकोळ घटनेबद्दल माझ्या नणंदेनं नीलेशला खूपच वाढवून अन् आक्रस्ताळेपणानं सांगितलं. नीलेशनं एकदम संतापून माझ्या थोबाडीत मारली…मला हा अपमान सहन झाला नाही. माझा आत्मसन्मान प्रचंड दुखावला. खरं तर घरात मला तसं महत्त्व नव्हतंच. घरकामाची मोलकरीण एवढीच माझी ओळख. घरातल्या कुठल्याही गोष्टीत दखल दिली की सासूबाईंना वाटायचं की, मी त्यांची सत्ता हिसकावून घेते आहे. नणंदेला वाटायचं, तिच्या भावाच्या प्रेमातला मोठा वाटा मी घेतेय. त्यावरून रोजच धुसफुस व्हायची. नीलेशचाही  माझ्यापेक्षा त्याच्या आईकडे व बहिणीकडे ओढा अधिक होता. तरीही आमचा संसार रूटुखुटू सुरू होता. एक मुलगाही झाला अन् मग तो प्रसंग घडला. मी ताबडतोब मुलाला घेऊन माझ्या माहेरी निघून आले. मला अशी आलेली बघून आईवडिल घाबरलेच. त्यांनी माझी खूप समजूत घातली पण मी ठरवलं होतं, आता वेगळं व्हायचं…शेवटी त्यांनीही हात टेकले.

दोन्ही बाजूंनी कोर्टात दावा दाखला झाला. खरं तर थोडी तडजोड करून प्रकरण मिटवता आलं असतं. पण नीलेशला तो आपला अपमान वाटला. नातलगांनी मध्ये लुडबुड करून प्रकरण अधिकच अवघड करून ठेवलं. नातलगांच्या मते हा प्रकार घराण्याच्या इभ्रतीवर बट्टा लावणं होतं. कुटुंबाचं नाक कापलं गेलंय असं काही म्हणाले. काहींनी अकलेचे तारे तोडले ‘अशा बायका प्रामाणिकही नसतात अन् पतिव्रता तर नसतातच…अशा बाईला घरा ठेवणं म्हणजे मुदतीचा ताप शरीरात सांभाळत बसणं आहे.’

वाईट गोष्टी तर चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढतात. दोन्ही बाजूंनी भरपूर चिखलफेक झाली. दोन्ही पक्ष जणू आरोपांची कबड्डी खेळत होते. नीलेशनं माझ्यावर वाईट  चारित्र्याचा आरोप केला…मी ही त्यांनी हुंड्यासाठी छळ केला म्हणून सांगितलं. आम्हाला एक मुलगा होता. सहा वर्षांचं वैवाहिक जीवन आम्ही एकत्र घालवलं होतं आणि आता आम्ही घटस्फोटासाठी भांडत होतो. खरं तर आता आम्ही दोघंही गप्प होतो. शांत आणि निर्विकार…वकीलच भांडत होते.

दोन वर्षं केस चालली. या काळात आम्ही नवरा बायको वेगवेगळे राहत होतो. दोघांनीही खूप काही सोसलं होतं. मी तर आईकडे आल्या आल्या चांगली नोकरी शोधून मुलाला उत्तम शाळेत अॅडमिशनही मिळवून दिलं होतं. पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही दोघांनीही मुलाच्या मनाचा, त्याच्या मन:स्थितीचा विचारच केला नव्हता. त्याचं मत जाणून घ्यावं असंही आम्हाला वाटलं नव्हतं.

मुलाला आमचं वेगळं होणं मान्य नव्हतं. पण सगळं त्याच्या डोळ्यादेखतच घडल्यामुळे तो गप्प होता. हियरिंगसाठी दोघांनाही यावं लागतं. आम्ही एकमेकांकडे तुच्छतेनं बघत असू. रागातच असायचो. एकमेकांवर सूड घेण्याचा विचार मनात असायचा. एकमेकांकडे बघून आपापली तोंडं फिरवून घेत होतो. बरोबरीचे नातलग स्फोटकं पेरल्यासारखेच होते. वकील आम्हाला शिकवायचे कोर्टात काय सांगायचं, कसं बोलायचं…कधी तरी आम्ही एकमेकांबद्दल चांगलंही बोलून जात असू…पण मग सावरून घेऊन पुन्हा पहिल्याप्रमाणे बोलत असू.

शेवटी एकदाचा घटस्फोट मंजूर झाला. पूर्वी नीलेशबरोबर खूपच खूप नातलग असायचे. हळूहळू संख्या कमी व्हायला लागली. नीलेशचे नातलग आनंदात होते. दोन्ही वकील आनंदात होते. पण माझ्या आईवडिलांना फार दु:ख झालं होतं. माझ्या फायली सांभाळत मी गप्प होते. नीलेशही त्यांच्या फायली घेऊन उदास बसले होते.

काय योगायोग बघा. त्या दिवशी कोर्टाचं काम थोडं उशीरा सुरू होणार होतं. बाहेर कडक ऊन होतं त्यामुळे सावलीसाठी आम्ही तिथल्याच एका टी स्टॉलवर बसलो होतो. आता हा देखील एक योगायोग म्हणायचा की आम्ही नवराबायको नेमके एकाच टेबलावर समोरासमोर होतो.

मी टोमणा मारला, ‘‘अभिनंदन…तुम्हाला जे हवं होतं, तेच आता घडतंय…’’

‘‘तुझंही अभिनंदन! तुलाही हेच हवं होतं. माझ्यापासून वेगळी होऊन तू जिंकते आहेस.’’ नीलेशनं म्हटलं. मला राहवलं नाही. मी बोलून गेले, ‘‘घटस्फोटाचा निकाल म्हणजे विजयाचं प्रतीक असतं का?’’

‘‘तूच सांग.’’ नीलेश म्हणाले.

मी उत्तर दिलं नाही. गप्प बसून राहिले. मग म्हटलं, ‘‘तुम्ही मला चारित्र्यहिन म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, बरं झालं अशा स्त्रीपासून सुटका झाली.’’

‘‘ती माझी फार मोठी चूक होती. मी तसं म्हणायला नको होतं…फार फार चुकलं…’’

‘‘मला प्रचंड मानसिक त्रास झाला.’’ मी निर्विकारपणे म्हणाले. आवाजात दु:ख नव्हतं, संवाद नव्हता. नीलेश म्हणाले, ‘‘मला कळतंय, पुरूष नेहमीच स्त्रियांसाठी हे हत्यार वापरतात. हा घाव स्त्रीचं अंत:करण रक्तबंबाळ करतो. तिचं मानसिक खच्चीकरण होतं. तू शुद्ध, पवित्र आहेस. तुझं चारित्र्य निष्कलंक आहे. मी इतकी खालची पातळी गाठायला नको होती. मला खरंच वाईट वाटतंय.’’

मी गप्प होते. नीलेशकडे बघितलं. काही क्षण तेही गप्प होते. मग एक दिर्घ श्वास घेऊन म्हणाले, ‘‘तू ही मला हुंड्यासाठी छळ केला म्हणालीस, पैशाचे लोभी म्हणालीस..’’

‘‘मीही खोटंच सांगितलं…मी ही चुकलेच. तसं काही नव्हतं.’’ थोडा वेळ कुणीच बोललं नाही…मग मी म्हटलं, ‘‘मी दुसरं काही म्हटलं असतं पण…’’ तेवढ्याच चहा आला.

मी चहाचा कप उचलताना गरम चहा माझ्या बोटांवर सांडला अन् मी कळवळले…नीलेशनंही अभावितपणे म्हटलं, ‘‘फार भाजलं का?’’

आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं.

‘‘तुझं कंबरेचं दुखणं कसं आहे आता?’’ नीलेशचं विचारणं मला खटकलं.

‘‘ठीकाय…’’ मी विषय संपवला.

‘‘तुमचं हार्ट…पुन्हा अटॅक वगैरे नाही ना आला?’’ मी विचारलं.

‘‘हार्ट ना? डॉक्टरांनी स्ट्रेस, स्टे्रन, मेंटल हॅरॅसमेंटपासून दूर रहा म्हटलंय.’’ नीलेश म्हणाले.

आम्ही एकमेकांकडे बघितलं…बघत राहिलो. जणू एकमेकांच्या चेहऱ्यावरचे ताणतणाव जाणून घेत होतो. एकटक बघता बघता मी विचारलं, ‘‘औषधं घेताय ना वेळच्या वेळी अन् नियमितपणे?’’

‘‘हो घेतो…पण आज नेमकी आणायला विसरलो.’’

‘‘तरीच आज थकल्यासारखे दिसताय…’’ मी सहानुभूतीनं म्हटलं.

‘‘हो…ते एक कारण आहेच आणि…’’ बोलता बोलता ते थांबले.

‘‘आणि मनावर ताणही आहेच ना?’’ मी वाक्य पूर्ण केलं.

काहीवेळ ते विचार करत होते, मग म्हणाले, ‘‘तुला १५ लाख रूपये द्यायचे आहेत आणि महिन्याला वीस हजार…’’

‘‘तर मग?’’ मी विचारलं.

‘‘एक फ्लॅट आहे…तुला ठाऊक आहेच. तो झ्या नावे करून देतो. सध्या १५ लाख माझ्यापाशी नाहीएत.’’ नीलेशनं मनातली गोष्ट सांगितली.

‘‘त्या फ्लॅटची किंमत तर तीस लाख असेल?’’

‘‘मला फक्त पंधरा लाखच हवेत.’’ मी माझी बाजू बोलले.

‘‘मुलगा मोठा होतोय…शंभर खर्च समोर येतील.’’ ते म्हणाले.

‘‘हो, पण वीस हजार दर महिन्याला तुम्ही देणार आहात ना?’’ मी म्हटलं.

‘‘हो, ते तर नक्कीच देईन.’’

‘‘तुमच्याकडे पंधरा लाख नसतील तर मला नका देऊ.’’ माझ्या स्वरात जुनी आपुलकी होती.

ते माझ्याकडे बघू लागले…मीही त्यांच्याकडे बघत होते. माझ्या मनात आलं, ‘‘किती साधा सरळ माणूस आहे…हा एके काळी माझा होता…माझा नवरा…इतका चांगला अन् मी त्याच्यातल्या उणीवा बघत बसले.’’

नीलेशच्या चेहऱ्यावर मला वाचता आलं…‘‘ही अजूनही माझ्या तब्येतीची काळजी करते…पैसाही नको म्हणतेय…मीच हिला समजून घ्यायला कमी पडलो.’’

आम्ही दोघं गप्प होतो. अगदी गुपचुप बसून होतो. फक्त एकमेकांचा चांगुलपणा आठवत होतो. दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते.

‘‘मला एक सांगायचं आहे,’’ जरा चाचरत ते म्हणाले.

‘‘बोला ना?’’ माझाही आवाज चिंब भिजलेला.

‘‘मला जरा भीती वाटतेय…’’

‘‘नका भिऊ…बिनधास्त बोला…कदाचित तुम्ही माझ्याच मनातलं बोलणार असाल…’’

‘‘मला तुझी आठवण येते…नेहमीच यायची.’’

‘‘मलाही…’’ मी पटकन् बोलून गेले.

‘‘मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो.’’

‘‘मी पण…’’ ताबडतोब मी म्हटलं.

आमचे डोळे अधिकच पाणावले…आवाजात सच्चेपणा आणि चेहऱ्यावर एकमेकांविषयीचं अथांग प्रेम…

‘‘आपण आपल्या आयुष्याला एक छानसं वळण नाही का देऊ शकणार?’’ नीलेशनं विचारलं.

‘‘कसलं वळण?’’ मी प्रश्नार्थक मुद्रेत.

‘‘आपण पुन्हा एकत्र राहूयात. एकमेकांबरोबर…पतिपत्नीपेक्षाही मित्र म्हणून, एकमेकांचे पूरक म्हणून?’’

‘‘पण मग ही फाईल? ही कागदपत्रं?’’ मी विचारलं.

‘‘फाडून टाकूयात…’’ नीलेश उत्साहानं म्हणाले अन् आम्ही आपापल्या हातातली कागदपत्रं फाडून, चिंध्या करून भिरकावून दिली. आम्ही दोघंही उठलो.

एकमेकांकडे बघून हसलो अन् एकमेकांचे हात हातात घेतले.

दोन्ही कडचे वकील चकित होऊन बघत होते. आम्ही हातात हात घालून घराकडे निघालो. प्रथम माझ्या घरी गेलो. माझ्या आईवडिलांचे आशिर्वाद घेतले. त्यांना  मनापासून आनंद झाला. गेली दोन वर्ष ते खूप मानसिक ताण सोसत होते. आज त्यांचे चेहरे आनंदानं उजळले होते. आमच्या मुलालाही खूप आनंद झाला. त्याला बरोबर घेऊन आम्ही आमच्या घरी आलो. आता हे घर फक्त आम्हा तिघांचं होतं.

काळ बदलला, परिस्थिती बदलली. आम्ही ही बदललो. आता आम्ही पतीपत्नी आणि मित्र म्हणून राहतो. कुठंही कडवटपणा नाही. आमचे संबंध सुधरले आहेत आणि आमच्यासारखे सुखी आम्हीच आहोत.

गट एनआरआय

कथा * संध्या सिनकर

मासिक वाचताना मला एक छान लेख दिसला. ज्यांची मुलं परदेशात आहेत, त्यांच्या गटाविषयी माहिती. त्या लेखात मला गणेशचे नाव दिसले. गणेश माझा बँकेतला जुना सहकारी. मी लगेच गणेशला फोन केला. गणेशने सांगितलं , ‘‘तो पुण्याला एका लग्नाला गेला असताना त्याला पुण्यातील अशा गटाविषयी माहिती कळली. घरी आल्यावर त्याने त्याच्या मित्रांना फोन केले. काही दिवसातच हा गट तयार झाला. ज्याचं नाव सर्वांनी मिळून एकमताने ठरवलं ‘गट एनआरआय.’’’ तो पुढे म्हणाला, ‘‘आम्ही ललिताच्या घरी शुक्रवारी भेटणार आहोत. तेव्हा तू तिकडे ये. सगळयांना भेट. गप्पाही होतील व तुला माहितीही मिळेल. मी तुला पत्ता एसएमएस करतो.’’

मी ललिताच्या घरी पोहोचले तर सगळे जण जमले होते. स्वागत व ओळख होऊन मी सोफ्यावर विसावले. चमचमीत पदार्थांचा सुगंध दरवळत होता. गप्पांचा किलबिलाट आणि हास्याची कारंजी उसळत होती. खाद्यपदार्थांची रेलचेल होती. स्वातीने आपल्या ताटलीत थोडे छोटे बटाटे वडे आणि एक पिझाचा तुकडा वाढून घेतला आणि श्यामकडे वळत ती म्हणाली, ‘‘आपल्या गटाला एक वर्ष झालं वाटतच नाही ना?’’ श्यामने हसत-हसत मान डोलावली. ‘‘हो ना’’ ललिता माझ्याकडे वळून म्हणाली, ‘‘गणेशने पुढाकार घेतल्याने आमच्या सर्वांच्या सहभागाने हा ‘गट  एनआरआय’ तयार केला. मग आम्ही मानसशास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांना भेटलो. त्यांना या क्षेत्रातला खूप अनुभव आहे. त्यांच्या सूचना आणि एकंदर विचार करून आम्ही गटासाठी काही गोष्टी ठरवल्या. जशा की आठवडयातून एकदा एकाच्या घरी आाळी पाळीने भेटायचे. एकमेकांच्या आजारपणात/अडचणीत मदत करायची. दोन-तीन महिन्यांनी एक दोन दिवसाच्या सहलीचा कार्यक्रम करायचा. एकमेकांच्या संपर्कात राहायचे.’’

‘‘खरंच डिसेंबरमध्ये गणेशच्या डोळयाच्या शस्त्रक्रियेच्या वेळेला तुम्ही सगळे मदतीला होतात, त्यामुळे काहीच अडचण आली नाही,’’ निशा म्हणाली.

‘‘विद्या रस्त्यात धडपडली आणि पायात रॉड टाकायला लागला, तेव्हाही पाच दिवसाचं हॉस्पिटलचं वास्तव्य तुमच्या सगळयांमुळे खूपच सोपं गेलं. मुलांनाही बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही.’’ इति विजय.

‘‘खरंच आपलं कोणीतरी जवळ आहे. एक फोन केला की आपल्यासाठी चारजण धावत येऊ शकतात. या विचारानेसुद्धा अगदी निर्धास्त वाटतं आणि रात्रीची झोपही चांगली लागते.’’ निशा म्हणाली.

‘‘अरे फक्त गप्पा मारू नका .भरपूर फोटोही काढा. नेहमीप्रमाणे आपल्या वहीत रंगीत पेपर प्रिंट चिकटवयाची आहे. अर्थात फोटो निवडणे व चिकटवणे आणि मिटिंगचा गोषवारा लिहिणे हे काम अर्थातच  माझे.’’ विजयने ती वही मला दाखवली. भरपूर फोटो होते. १२ जणांचा ग्रुप.

गणेश व निशा

गणेश  बँकेतून निवृत्त व निशा निवृत्त शिक्षिका.

गणेशने सांगायला सुरूवात केली, ‘‘माझी मोठी मुलगी डेंटिस्ट आणि मुलगा संगणक अभियंता. दोन्ही मुलांनी बाहेरच्या देशात जायचे नाही असे ठरवले होते. त्याप्रमाणे घराजवळच मुलीसाठी प्रॅक्टिस करायला जागा शोधत होतो.

‘‘तेव्हा ती एका वरिष्ठ दंतवैद्याकडे अनुभव घेत होती. मुलगा पुण्याच्या एका मोठया संगणक कंपनीत नोकरीला लागला. आम्ही पुण्यात त्याच्यासाठी घर बघायला सुरूवात केली आणि आता मुलीच्या लग्नाच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू केले. स्थळ बघत असताना माझ्या मित्राच्या मुलाची माहिती कळली. तो संगणक अभियंता. अमेरिकेत वास्तव्य. चांगला पगार. घरचे सगळे परिचित. त्यामुळे मुलीला म्हटले बोलून तर बघ त्याच्याशी. ते दोघे भेटले. एकमेकांना पसंत केले आणि लग्न करून मुलगी अमेरिकेत गेली. मास्टर्स केले व काम करायला सुरुवात केली. मुलगी तिकडे गेल्यावर तिने भावाला तिकडच्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या चांगल्या संधीबद्दल माहिती दिली व त्याने अमेरिकेत जाण्याचे ठरवले. आमची काही आडकाठी अर्थातच नव्हती. आता तोही मास्टर्स करून नोकरी करत अमेरिकेत स्थिरावला आहे.’’

मीना व शैलेश

मीना औषध निर्माण महाविद्यालयातून निवृत्त प्राध्यापिका, शैलेश औषध निर्माण कंपनीतून निवृत्त.

मीनाच्या शब्दात सांगायचं तर दोन मुली. मोठ्या मुलीने औषध निर्माण शास्त्रामध्ये मास्टर्स केले. लग्न करून नवऱ्याबरोबर पीएचडीसाठी जर्मनीत गेली. आता दोघेही शिक्षण संपवून जर्मनीत कार्यरत. दुसरी मुलगी एमबीबीएस. थोडा अनुभव घेऊन आता पुढील शिक्षणासाठी जर्मनीत.

ललिता व वसंत

ललिता गृहिणी, तर वसंत खाजगी कंपनीतून निवृत्त.

ललिताने सांगितले की, ‘‘दोन मुले. एक मुलगा व एक मुलगी. दोघेही संगणक अभियंता. दोन्ही मुलं संगणक अभियंता झाल्यावर पुण्याला एका मोठया संगणक कंपनीमध्ये नोकरीला लागली. मुलीचे लग्नही पुण्याच्या एका संगणक अभियंत्याशी झाले. आम्ही तिघांनीही एकाच संकुलामध्ये वेगवेगळया सदनिका घेतल्या. दरम्यान मुलाला त्याच्या कंपनीने एका प्रोजेक्टवर अमेरिकेला पाठवले. तिकडचे वातावरण त्याला आवडले. मग वर्षभरानंतर सुट्टीत येऊन लग्न करून तो परत अमेरिकेला निघून गेला. नंतर तो नोकरी बदलून अमेरिकन कंपनीमध्ये रुजू झाला. दरम्यान मुलगी आणि जावईसुद्धा अमेरिकेत शिफ्ट झाले. मग आम्ही पुण्याचे घर बंद करून आमच्या ठाण्याच्या मूळ घरी परत आलो.

नीता व मंदार

नीता गृहिणी, मंदार एअर इंडियातून निवृत्त.

नीताच्या म्हणण्यानुसार एक मुलगा मेकॅनिकल इंजीनिअर. भारतात ४ वर्ष नोकरी केली. अधिक चांगली संधी मिळाल्यामुळे ७ वर्षापासून दुबईत नोकरी करतोय. सूनसुद्धा दुबईत नोकरी करते.

विद्या व विजय

दोघेही खाजगी कंपनीतून स्वेच्छा निवृत्त.

विद्याच्या शब्दात एकच मुलगा. त्याची डिफेंसमध्ये जायची इच्छा होती. पण दृष्टीतील किंचितशा कमतरतेमुळे निवड झाली नाही. आता हॉटेल मॅनेजमेंट केले व मास्टर्स करून कॅनडामध्ये कार्यरत.

स्वाती व श्याम

स्वाती गृहिणी व श्याम राज्य सरकारी नोकरीतून निवृत्त.

श्यामने सांगितलं, ‘‘दोन मुलगे. दोन्ही संगणक अभियंता, दोघेही मास्टर्स करून अमेरिकेत कार्यरत.

‘‘विजय तू खूप छान वही ठेवली आहेस. फोटो व थोडक्यात माहिती दोन्ही मस्त. हा गट तयार झाल्यामुळे तुमची मुलंसुद्धा खुश झाली असतील ना?’’ मी म्हटलं. ‘‘मुलं खूपच रिलॅक्स झाली.’’ निशा म्हणाली, ‘‘सगळया मुलांनी काका काकूंचे नंबर घेऊन ठेवले आहेत. त्यामुळे कोणाची शुगर वाढली तर त्याला ओरडण्यासाठी बाकी काका-काकूंना फोन करणे हे मुले लगेच करतात.’’

स्वाती म्हणाली, ‘‘यावेळी मी मुलांना सांगितलं की दरवर्षी सुट्टीत तुम्ही भारतात येता. यावेळी तुम्ही दुसरीकडे फिरून या.’’

गणेश म्हणाला, ‘‘आम्ही आता इकडच्या जवळच्या निवृत्त पेन्शनर्स असोसिएशनला जोडून घेतले आहे. त्यामुळे त्यांची आहार विषयक व्याख्याने किंवा डॉक्टरांच्या व्याख्यानांना आम्ही जमेल तसे जातो. तसंच आता आमचा  आठवडयातून एकदा योगा क्लास लावायचा किंवा योगाशिक्षकाला घरी बोलावून एकत्र योगा करण्याचा विचार आहे. गेले दोन महिने आम्ही महिन्यातून  एकदा पालीतील वृद्धाश्रमाला एक दिवस जातो. थोडी आर्थिक मदतही करतो. कर्जतच्या ‘शांतिनिकेतन अनाथाश्रमात’ धान्य पाठवतो.

आणखी ८ जणांना आमच्या गटात सामील व्हायचं आहे. पण आता आम्ही विचार करतोय की छोटे १०-१२ जणांचे वेगळे वेगळे गट करावेत व वर्षातून २-३ वेळेला सगळया गटाने एकत्र भेटावे.’’

तेवढयात कुणीतरी गाणं लावलं व बरीच पावलं थिरकायला लागली. सगळं वातावरण आनंद, उत्साह व  सकारात्मकतेने भरलेलं होतं. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेताना मला वाटलं की असे सारखी आवड जसे प्रवास, वाचन, पाकक्रिया, गाणे व वादन असलेल्यांचेही गट बनायला हवेत व सर्वांनी जीवनातील आनंद भरभरून लुटायला हवा.

मी आहे राणी

मिश्किली * डॉ. अरुणा शास्त्री

अहो मॅडम, हो, तुम्हालाच म्हणतेय मी… हल्ली आम्ही बाईसाहेब, माईसाहेब वगैरे न म्हणता सरळ मॅडमच म्हणतो. काही जणी म्याडम म्हणतात. तर मॅडम, तुमची हिम्मत कशी झाली मला मोलकरीण, कामवालीबाई, भांडी घासणारी, धुणंभांडी करणारी वगैरे म्हणायची? मला हाक मारताना माझ्या नावाने अन् प्रेमाने हाक मारायची नाही तर सरळ मेड सर्व्हंट किंवा मेड म्हणायचं. नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. मी मोलकरीण किंवा कामवाली नाही. जिथे काम करायला जाते तिथे राणीच्या रूबाबात राहाते. मोलकरीण तर कुणी मला म्हणूच शकत नाही. कुठल्याही नोकरीची पत्रास मी बाळगत नाही. मनात येईल तेव्हा तुमची टुकार नोकरी मी सोडू शकते. गरज तुम्हाला आहे माझी…मला नाही. वाट्टेल तेवढी कामं मिळतात मला. एक घर सुटलं तर दहा घरं असतात जी मला हातोहात उचलतात. ठेवायचं तर ठेवा, नाही तर मी चालले…मै चली, मै चली…ला ला ला. लाला ला…

कामं मी माझ्या मर्जींने आणि माझ्या अटींवर करते हे तुम्ही विसरायच नाही हं, मॅडम. मला कामावर ठेवाल तेव्हा वेळेचं बंधन मला घालायचं नाही. मी काही तुमच्यासारखी किंवा साहेबांसारखी ऑफिसात काम करत नाही जिथे वेळेत पोहोचणं कंपलसरी असतं. मी आरामात माझ्या घरातली कामं करून, मग नटूनथटून कामावर येते. म्हणून ‘उशीर केला, वेळेवर आली नाहीस’ वगैरे कटकट करायची नाही…कळलं?

एक गोष्ट अजून ऐकून घ्या. माझ्याकडे माझा मोबाइल आहे. त्यावरून मी कुणाशीही, कितीही वेळ, केव्हाही अन् कधीही बोलेन. तुम्ही त्यावर आक्षेप घ्यायचा नाही, की कामं खोळंबली आहेत, ही गप्पा मारते, असं बडबडायचं नाही.

त्याशिवाय मला जेव्हा वाटेल तेव्हा, जितक्या वेळा वाटेल तितक्या वेळा हवा तेवढा म्हणजे दीड दोन कप चहा लागतो. त्याशिवाय माझं हातपाय चालत नाहीत. कडक अन् गोडगट्ट चहा घेताना मला कुणी हटकलेलं खपत नाही.

आणि हो मॅडम, अजून एक…दुपारी मला माझ्या आवडत्या सीरियल्स बघायच्या असतात. जर मी फुल स्पीडवर पंखा लावून मूव्ही किंवा सीरियल बघितली तर तुम्ही उगीचच घर डोक्यावर घेऊ नका. कारण टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींमुळे माझं सामान्य ज्ञान खूपच वाढतं. कुठल्या डिटर्जण्टमध्ये शंभर लिंबाची शक्ती आहे अन् कुठली पावडर दहा हातांनी मळ काढते हे सगळं त्यातूनच तर कळतं. आमचे हात मऊ राहायला हवेत. आम्हाला कंबरदुखीचा त्रास नको म्हणून तर या सगळ्या जाहिराती असतात. तुम्ही त्या सर्व वस्तू आधीच घरात आणून ठेवा.

मॅडम, आधीच क्लीयर करा हं. तुमचे सासूसासरे तुमच्या सोबत राहातात का? जिथे म्हातारी खोडं राहातात त्या घरात मी काम करत नाही. कारण जेवढा वेळ आम्ही काम करतो, तेवढा वेळ खडूस म्हातारी डोक्यावर उभी राहाते, ‘इथून केर काढला नाही,’ ‘तिथून पुसून घेतलं नाही,’ असं नाही अन् तसं नाही…खरं कारण असं असतं मॅडम की सुनांवर त्यांची सत्ता नसते म्हणून त्या आम्हाला वेठीला धरतात.

आणि हो, तुमच्या घरात लहान मुलं असली अन् कधी प्रेमाने मी त्यांना एखादी थप्पड मारली तर लगेच पोलिसात कम्पलेंट करायला जाऊ नका. कळलं ना? माझी स्वत:चीही पोरंबाळं आहेतच ना? त्रास देतात तेव्हा त्यांनाही बदडून काढतेच ना मी? तुमच्या मुलांना माझी मुलंच समजेन. कधी तरी दिले दोन धपाटे तर तारांगण घालायची गरज नाही. घरात सी.सी. कॅमेरे लावल्याची धमकी कोणाला देताय? त्या सी.सी. कॅमेऱ्याला अन् तुम्हालाही कसं गुंडाळायचं ते मला बरोबर येतंय.

अजून एक गोष्ट क्लीयर व्हायला हवीय. माझं स्वत:चे रूल्स अन् रेग्युलेशन्स आहेत. मी कामावर जॉइन होण्याआधीच एका महत्त्वाच्या मुद्दयावर डिस्कस करून घेते. मला आठवड्याला एक याप्रमाणे महिन्याला चार सुट्टया लागतात.? खरं तर मला ‘सिक्स डेज वीक’ ही कामाची पद्धत आवडते. त्याखेरीज सणावाराला सुट्टी मला घ्यावीच लागेल. घरी आम्हीही सणवार करतो ना?

त्याखेरीज कधी मी आजारी पडले, कधी नवरा, कधी मुलं आजारी झाली आणि कधी नात्यात एखादी मयत झाली, अजून काही घडलं तर मी रजा घेणारच! तुमच्या घरी पाहुणे येणार तेव्हाही मी रजेवर जाणारच!

सुट्टयांसाठी वाट्टेल तेवढी कारणं आहेत माझ्यापाशी. खरं तर रजेची १०१ कारणं असं पुस्तकही मी लिहू शकते. पण काय करू, मला लिहायला, वाचायला येत नाही ना? पण मी शिकलेल्या भल्याभल्यांचा नक्षा उतरवते.

मॅडम, आता थोडं अॅडव्हान्सविषयी बोलून घेऊयात? अॅडव्हान्स घेण्यासाठीही माझ्याकडे १०१ कारणं आहेत. गरज तुम्हाला माझी आहे त्यामुळे थोडी कटकट करून का होईना तुम्ही मला अॅडव्हान्स द्यालच. चारपाच हजार मला अॅडव्हान्स लागतील. कापताना मात्र फक्त मी महिन्याला दोनशेच कापून देईन. कटकट केलीत तर अॅडव्हान्स परत न करताच तुमचं काम सोडून पळून जाईन.

मी अत्यंत प्रामाणिक आहे. चोरीमारी करत नाही. अगदी बारीकशी सुईसुद्धा कधी चोरली नाहीए. पण बाकी अनेक गोष्टी अगदी बेमालूम नाहीशा होऊ शकतात. पुन्हा माझा संशय कुणी घेणार नाहीच. कारण मी स्वत: काहीच करत नाही पण दुसऱ्यांना बातमी तर देऊ शकते ना? घरातल्या सर्वांची दिनचर्या मला ठाऊक असते. कोण केव्हा जातं, कोण केव्हा येतं, सोनंनाणं कुठे ठेवलेलं असतं. समुद्राकाठी सुट्टी घालवायला कधी जाणार हे सगळं मलाच ठाऊक असतं. माझ्याकडून माहिती घेऊन हातसफाई दाखवणारा कुणी वेगळाच असतो. त्यामुळे मला मुद्देमालासकट कधीच कुणी पकडू शकणार नाही.

बरं, तर मॅडम, आता थोडं पर्सनलही बोलून घेऊयात? म्हणजे हा मुद्दा तसा रोमॅण्टिक आहे. म्हणजे कसं की तुमचे फारसे म्हातारे न झालेले साहेब किंवा वयात आलेला मुलगा यांना नादी लावण्याचेही १०१ प्रकार मला येतात. आता बघा, केरफरशी करताना माझी साडी पोटऱ्यांपर्यंत वर खोचलेली असते तिकडे त्यांचं लक्ष गेलं किंवा तुम्हीच दिलेल्या ‘लो कट’ ब्लाउजकडे ते टक लावून बघत बसले अन् त्यांना ‘कुछ कुछ’ व्हायला लागलं तर मला दोष द्यायचा नाही. कारण तुम्ही दिलेलेच ‘लो कट’ ब्लाउज मी वापरणार. तुमच्या नकळत त्यांनी मला बक्षीस, चिरीमिरी दिली तर तुम्ही रागवायचं नाही. अर्थात् मी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचूच देणार नाही म्हणा…

आणि बरं का म्याडम, एक मजेदार गोष्ट अजूनही तुम्हाला सांगितलेली नाहीए. तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तुमच्या घरात काम करणाऱ्या आमच्यासारख्या मेडसर्व्हंट्स जेव्हा आपसांत भेटतात तेव्हा त्या काय काय बोलतात. त्यांच्या गप्पांमध्ये फक्त तुम्ही लोकच ‘टारगेट’ असता.

प्रत्येकीने आपापल्या मालकिणींना त्यांचं रंगरूप अन् स्वभावावरून मजेदार नावं दिली आहेत. कुणी ‘काळीढुस्स म्हैस’ आहे कुणी सुस्तावलेला अजगर आहे. कुणी मांजरीसारखी चोरून खाणारी, तर कुणी फॅशनेबल बेडकी. मॅडम, आम्ही तुमच्या नकलादेखील करतो. आम्ही सुट्टी घेतली की तुमची कशी चिडचिड होते, किती फजिती होते याची नक्कल करून तर आमची खूपच करमणूक होते.

आम्ही अनेक तऱ्हेने स्वत:ला रमवून घेतो. कॉलनीत कुणाकडे काय चाललंय, कुणाचं कुणाशी लफडं आहे. कुणाच्या घरात दोघांमध्ये तिसरा ‘तो’ किंवा ‘ती’ आहे याची बितंबातमी आमच्याकडे असते. त्यातून पुन्हा त्या सर्व बातम्यांना तिखटमीठ मसाला लावून आम्ही त्या सगळीकडे पसरवण्याचं महत्त्वकार्य करतो. या बातम्या व्यवस्थित ब्रॉडकास्ट होतात, आमचं हे न्यूज चॅनल खूपच लोकप्रिय आहे.

आपल्या मालकिणीला ब्लॅकमेल करायला मला आवडतं. सणासुदीला बक्षिसी अन् दिवाळीचा बोनस तर घेतेच, पण दरवर्षी पगारवाढही घेते. याखेरीज कुणी आपल्या मेडला काय दिलं हे पण वाढवून सांगते. म्हणजे आपण कमी पडू नये या भीतीने मालकीण मलाही भरभरून देते.

आता जाता जाता शेवटचं सांगते. वाटलं तर धमकी समजा. आमच्या घरकाम करणाऱ्या मेड सर्व्हंट्सची एक युनियन आहे. मीच त्याची अध्यक्ष आहे. आमच्या मंथली मीटिंग्ज असतात. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही चक्क संपावर जातो. तक्रार करायला पोलिसात जायलाही मागेपुढे बघत नाही. कारण शेवटी जिंकणार आम्हीच आहोत. कारण कायदा आमचीच बाजू घेणार ही आम्हाला खात्री आहे. आम्ही सर्वव्यापी आहोत. सर्वशक्तिमान आहोत. तुम्हाला कामावर ठेवायचं असेल तर ठेवा…नाही तर ही मी निघाले…

सुंदर नातं मैत्रीचं

कथा * सुधा काटे

वडिलांच्या आकस्मिक मृत्युची बातमी कळताच सीमाला ताबडतोब जावं लागलं. त्यांचं तेरावं आटोपून ती परत स्वत:च्या घरी परतल्यावर तिने लॅपटॉप उघडून फेसबुकवर लॉग इन केलं. फ्रेण्ड रिक्वेस्टवर क्लिक केलं अन् जे नाव समोर आलं, ते बघताच ती दचकली.

‘‘अगंबाई, हा तर शैलेश!’’ ती उद्गारली. इतकी वर्षं मध्ये गेल्यामुळे शैलेश तसा विस्मरणात गेला होता. पण ते नाव समोर आलं आणि तिला शैलेशबरोबर घालवलेले दिवस पुन्हा जसेच्या तसे आठवले.

दोघंही एकाच कौलेजचे विद्यार्थी होते. शैलेश अभ्यासात फार हुशार होता. शिवाय तो उत्तम गायक आणि वादक होता. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत सीमा अन् तो नेहमीच गात असत. त्या दोघांमुळेच यूथ फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या कॉलेजला नेहमीच बक्षीसं मिळायची. गाण्याच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने दोघं वरचेवर भेटायची.

एकदा सीमा आजारी पडली. आठ दिवस ती कॉलेजला जाऊ शकली नाही तेव्हा काळजी वाटून शैलेश तिचा पत्ता शोधत थेट घरीच येऊन धडकला.

अशक्तपणामुळे अजून पुढले आठ दिवस सीमा कॉलेजला जाऊ शकत नव्हती म्हणून त्याने स्वत:च्या नोट्स तिला दिल्या. अभ्यासही करवून घेतला. त्यामुळे सीमाला पेपर सोपे गेले अन् फर्स्टक्लास मिळाला. हा हुशार, कलाकार मुलगा अत्यंत कनवाळू अन् सज्जन आहे हे सीमाला जाणवलं.

हळूहळू त्यांची ओळख मैत्रीत बदलली. कॉलेजात ती दोघं आता सतत बरोबर असायची, त्यांच्याबद्दल कॉलेजात चर्चा चालायची. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. ती आपल्यातच दंग असायची. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. पण प्रेमाला अजून अभिव्यक्ती नव्हती. फक्त ते त्यांना एकमेकांच्या डोळ्यांत दिसायचं. प्रेमाचा उच्चार झाला नव्हता.

तरीही प्रेमाची धुंदी होतीच. एकमेकांच्या आवडीनावडीचा विचार प्रामुख्याने केला जायचा. टळटळीत उन्हाच्या दुपारीही एकमेकांच्या संगतीत चांदणं पसरल्याचा भास व्हायचा. लोकांची पर्वा तर करण्याचा प्रश्नच नव्हता.

मनातल्या मनात भविष्यकाळाची स्वप्नं रंगवताना ती पूर्ण होतील की नाही हा विचारच त्या वेड्या वयात मनात येत नाही. प्रेमाची साद मनात, शरीरात भिनत असते. बाहेरच्या जगात शिशिर ऋतू असो की कुठलाही ऋतू असो, प्रेमिकांच्या मनात कायम वसंत फुललेला असतो. श्रावणसरीत चिंब भिजायला मन आसुसलेलं असतं. प्रेमाचे सप्तरंग सर्वत्र दिसत असतात.

शिक्षण पूर्ण झालं अन् शैलेश आपल्या घरी निघून गेला. तो दूर उत्तर प्रदेशात, बनारसला राहात असे. एकमेकांना पत्र पाठवायची असं दोघांचं ठरलं होतं. वर्षभर पत्रांची आवकजावक होतीही. पण त्यानंतर त्याची पत्रं येणं बंद झालं. सीमाने किती तरी पत्रं पाठवली पण एकाचंही उत्तर आलं नाही. त्या काळात मोबाइल किंवा इंटरनेट नव्हतंच. साधे लॅण्ड लाइन फोनही सर्रास नसायचे. हळूहळू सीमानेही पत्रं पाठवणं बंद केलं. आता  शैलेशला विसरणं भाग आहे हे सत्य स्वीकारावंच लागलं.

सीमा सुशिक्षित होती. चांगल्या घराण्यातली होती. तिची विचारसरणी स्वच्छ होती. नातं नेहमी दोन्ही बाजूंनी जोपासलं जातं हे तिला कळत होतं. त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आपण त्याच्या गळी पडायचं नाही हेही तिला कळत होतं. त्यामुळेच तिने शैलेशला आपल्या आयुष्यातून काढून टाकलं. हळूहळू तो विस्मरणात गेला. कधी तरी ते नाव ऐकलं तर एक चेहरा अंधुकपणे डोळ्यासमोर तरळून जायचा बस्स! याहून अधिक काहीच नाही.

काळ सतत पुढे सरकत असतो. सीमाचं लग्न झालं. दोन मुलंही झाली. सुनील शिकलेला, मनाचा सज्जन अन् भरपूर कमावणारा होता. पण धंद्यात इतका गुंतलेला की बायकोसाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता. सीमाला पैशाला तोटा नव्हता. सुनीलचा जाचही नव्हता. पण ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. बरंच काही असूनही ‘काहीतरी’ मिसिंग आहे असं तिला वाटायचं.

१५ वर्षांनंतर फेसबुकवर शैलेशशी संपर्क झाला अन् सीमाच्या मनात प्रचंड घालमेल झाली. आता पुन्हा नव्याने संबंध कशाला सुरू करायचा या विचाराने तिने रिक्वेस्ट न करण्याचा निर्णय घेतला.

मध्यंतरी चार पाच दिवस गेले अन् त्याचा मेसेज आला. भेटण्याची खरोखर इच्छा असली तर नियतीही ती भेट घडवून आणण्यात हातभार लावते. यावेळी तिने मेसेजचं उत्तर दिलं. चार दोन मेसेज झाले तेव्हा तिला कळलं शैलेश पुण्यात स्थायिक झालाय. बायकोमुलांसह राहातोय. मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली.

मग संवाद सुरू झाला. पहिल्यांदा शैलेशचा आवाज ऐकून ती रोमांचित झाली. तिचा कंठ दाटून आला. त्याच्या ‘तू कशी आहेस?’ या प्रश्नाला तिला उत्तर देणं जमेना.

कशीबशी बोलली, ‘‘मी बरी आहे. तुला अजून आठवण आहे माझी?’’

‘‘म्हणजे काय? मी तुला विसरलोच नव्हतो तर आठवण आहे का या प्रश्नाला काय अर्थ आहे?’’ तिच्या हृदयाची धडधड वाढली. कानशिलं गरम झाली.

‘‘असं जर होतं, तर पत्रं पाठवणं का बंद केलंस?’’

‘‘अगं. तुझं एक पत्र आईच्या हातात पडलं. तिने त्यावरून आकाशपाताळ एक केलं. यापुढे तुला पत्र पाठवणार नाही असं माझ्याकडून वचन घेतलं. मला  स्वत:ची शपथ घातली. मी तिचा एकुलता एक मुलगा ना? मला ऐकावंच लागलं. काय करणार?’’

सीमाला तक्रारीला जागा नव्हती. कारण त्याने ‘तुझ्याशी लग्न करेन, आपण एकत्र राहू’ असं तिला कधीच म्हटलं नव्हतं. तिनेही आपलं प्रेम या शब्दात व्यक्त केलं नव्हतं. तरीही दोघांमध्ये एक अतूट नातं होतं.

चला, बोलण्यामुळे निदान परिस्थिती काय होती ते तर कळलं. बोलली नसती तर अढी मनात राहून गेली असती.

काळानुरूप सगळी सृष्टीच बदलत असते. शरीरात बदल होतात. बुद्धी परिपक्व होते पण मन मात्र तसंच राहातं. प्रत्येक माणसाच्या आत एक लहान मूल दडलेलं असतं. संधी मिळाली की ते कोणत्याही वयात आपलं अस्तित्त्व दाखवायला लागतं.

त्यांच्या गप्पा फोनवर चालायच्या. मर्यादा सांभाळून दोघंही बोलायची. मधल्या इतक्या वर्षांच्या गॅपनंतरही दोघांना जुने दिवस, जुने प्रसंग आठवत होते. गप्पा मारताना पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळत होता. काही गोष्टी सीमा विसरली होती त्याची आठवण शैलेशने करून दिली. काही गोष्टी शैलेशच्या लक्षात नव्हत्या, त्याची सीमाने त्याला आठवण करून दिली. जुने दिवस आठवताना खूप मजा वाटायची.

मध्येच सीमाला वाटायचं आता आपण विवाहित आहोत. दोन मुलं आहेत. जुन्या, कॉलेजमधल्या मित्राशी असे संबंध ठेवणं गैर तर नाही ना? अजून तिने याबद्दल नवऱ्यालाही सांगितलं नव्हतं. हे असं पुढे किती काळ सुरू राहील?

मनाच्या अशा दोलायमान अवस्थेतच पाचसहा महिने निघून गेले. हे नव्याने निर्माण झालेलं नातं असंच जपलं जावं, ते ओझं ठरू नये असं दोघांनाही वाटत होतं. सुरुवातीला रोमांचक, थ्रीलर वाटणारं संभाषण आता दिलासा देणारं, आधार देणारं ठरलं होतं. ऐकलेली एखादी बातमी एखादा चांगलासा विनोद शेयर केल्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटायचं.

एकदा शैलेशने सांगितलं की ऑफिसच्या कामासाठी त्याला लवकरच दिल्लीला जावं लागणार आहे. त्यावेळी तो सीमाला नक्कीच भेटेल. तिच्या नवऱ्याला व मुलांना भेटायलाही त्याला आवडेल.

हे ऐकून सीमा एकदम आनंदली. पण लगेच तिला वाटलं, फोनवर भेटणं, बोलणं इथवर ठीक आहे. पण प्रत्यक्ष भेटणं? भेटावं की न भेटावं? ती थोडी भांबावली. दुसरं मन म्हणालं, भेटायला काय हरकत आहे? आता तुम्ही दोघंही विवाहित आहात. नवथर वय कधीच ओलांडलं आहे. जबाबदारीने वागणं सहज जमायला हवं. चांगले मित्र म्हणून भेटायला काय हरकत आहे?

‘‘सुनीलना काय वाटेल?’’ पहिल्या मनाने शंका काढली.

दुसरं मन म्हणालं, ‘‘काय वाटायचंय? विवाहित स्त्रीला मित्र असू नयेत असं त्यांनी कधीच म्हटलं नाहीए. त्यांना तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तर तू स्वत:च्या मानसिक गरजेसाठी शैलेशचा आधार घेतला म्हणून ते रागावणार नाहीत. एकदा शैलेशला भेटून बघ. मग मुलांशी अन् सुनीलशीही त्याची ओळख करून दे.’’

ही गोष्ट सीमाला पटली. ती उत्सुकतेने शैलेशच्या येण्याची वाट बघू लागली.

त्या दिवशी सकाळीच सुनील बिझनेस मीटिंगसाठी कोलकात्याला गेला होता. मुलं शाळेत गेली होती अन् शैलेशचा फोन आला. शैलेशने तिला कनॉट प्लेसच्या एका कॉफी हाउसमध्ये भेटायला बोलावलं होतं. ती घरी एकटी असताना त्याने घरी यावं हे तिलाही जरा विचित्र वाटत होतं. त्यामुळे बाहेर सार्वजनिक ठिकाणी भेटणं एकंदरीतच सोयीचं होतं.

शैलेशला इतक्या वर्षांनंतर भेटताना आपल्याला भावना अनावर होतील का? तो कसा रिअॅक्ट होईल वगैरे मनातल्या शंकांचं प्रत्यक्ष भेटीत निरसन झालं. खूप प्रेमाने त्याने सीमाला रिसीव्ह केलं. एवढ्या वर्षांत तो फारसा बदलला नव्हता. केसांमध्ये थोडी रुपेरी झणक जाणवत होती. पूर्वीसारखाच मोकळेपणाने वागतबोलत होता. तीही मनमोकळी झाली.

कॉलेज सोडल्यापासूनची सर्व माहिती त्याने दिली. त्याची नोकरी, पत्नी, मुलंबाळं…संसारात अन् नोकरीत तो सर्वार्थाने सुखी होता पण तरीही सीमाची त्याच्या मनातली जागा कुणीच घेऊ शकणार नव्हतं.

हे ऐकून सीमाला मनातून खूप बरं वाटलं. स्वत:विषयीच्या गर्वाने मन भरून आलं.

शैलेशने विचारलं, ‘‘तुझं गाणं म्हणणं अजून चालू आहे?’’ दुखऱ्या जखमेला धक्का लागावा तशी मनातल्या मनात सीमा कळवळली. पण वरकरणी सहज बोलावं तसं बोलली, ‘‘छे: रे, मला वेळच मिळत नाहीए. सुनील त्यांच्या धंद्यात बिझी असतात अन् त्यांना गाण्याची फारशी आवडही नाहीए.’’

‘‘त्यांना वेळ नसेल, आवडही नसेल, पण तुला तुझी आवड पूर्ण करू नकोस असं कधी म्हणाले का ते? तुझ्याजवळ पैसा आहे. गाडी, ड्रायव्हर आहे, मुलं अगदी लहान नाहीत, तू तेवढा वेळ सहज काढू शकतेस…’’ शैलेश म्हणाला.

हे शब्द, हे प्रोत्साहन खरं तर सीमाला सुनीलकडून अपेक्षित होतं. त्याने तिच्या गाण्याबद्दल, आवाजाबद्दल कधीच प्रशंसोद्गार काढले नव्हते. पण तिने तरी कधी मोकळेपणाने आपल्या या गुणाविषयी, आवडीनिवडीविषयी त्यांना सांगितलं होतं?

तिने एक नि:श्वास सोडला. मनातच ठरवलं यापुढे आपण गायचं, क्लासला जाऊन अधिक चांगलं शिक्षण घ्यायचं. लोकांपुढे आपली कला मांडायची.

तिला विचारात हरवलेली बघून शैलेश म्हणाला, ‘‘आपला दोघांचा एक अल्बम काढूया. आपल्या मॅच्यूरिटीला साजेशी गाणी निवडू. मित्र म्हणून, सहकारी म्हणून आपण भेटत जाऊ. पुढल्यावेळी मी माझी पत्नी व मुलांनाही आणेल. तुझा नवरा व मुलंही असतील, कौटुंबिक पातळीवरची मैत्री या वयाला अधिक भावते. आपण फोनवर बोलतो तेव्हा या बाबतीत अधिक चर्चा करू.’’

सीमाला शैलेशच्या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं, आत्तापर्यंत तिच्या मनात रिक्त असलेली ‘चांगल्या मित्राची’ जागा शैलेशने घेतली होती. जगण्याला एक चांगला उद्देश, एक नवी दिशा मिळाली होती.

निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा सीमाने मोकळ्या मनाने शेकहॅण्ड केला. ‘गाणं सुरू करते’ म्हणून खात्री दिली. शैलेशच्या मनात तिची खास जागा आहे ही भावना सुखावणारी होतीच. त्यामुळे आता तो दूर असला तरी त्यांच्यात दुरावा नव्हता.

अल्लड वयातली प्रेमभावना आता नव्हती. त्यावेळी ते प्रेम अव्यक्त होतं. पण आज व्यक्त झालेली मित्रत्त्वाची भावना अधिक बोलकी आणि अर्थपूर्ण होती. हे नातं अभिमानाने मिरवण्याचं होतं. आपुलकीने जपायचं होतं. हे नातं मित्रत्त्वाचं होतं. मैत्रीचं होतं.

सदैव खावे : ताजे अन् नवे

कथा * डॉ. नीरजा श्रावस्ती

दाराची घंटी वाजली म्हणून भानूने दार उघडलं. दारात त्याची मामेबहीण पम्मी म्हणजे प्रमिला एका हातात स्ट्रोलर सूटकेस अन् दुसऱ्या हातात भली मोठी पर्स घेऊन हसतमुखाने उभी होती.

‘‘अगं, अचानक कशी आलीस?’’

‘‘आत तर येऊ दे, मग सांगते,’’ म्हणत पम्मी सरळ ड्रॉइंगरूममध्ये आली अन् बॅग एकीकडे ठेवून सोफ्यावर बसली.

मोठ्याने, जरा रागीट सुरात भानूने बायकोला हाक मारली, ‘‘घंटी वाजलेली ऐकली नाहीस का? कोण आलंय बघ.’’

भानूचा आवाजाचा टोन अन् बोलायची पद्धत प्रमिलाला खटकली. बायकोला असं बोलायचं?

‘‘मामामामी कसे आहेत?’’

‘‘मजेत! तुझ्या आवडीचे लाडू करून पाठवलेत आईने.’’ पम्मीने बॅगेतून लाडूचा डबा काढून भानूला दिला अन ती चप्पल काढून स्वयंपाकघरात गेली.

नमिताने कणिक तिंबून ठेवली होती अन् ती धुतलेले हात नॅपकीनला पुसत होती. पम्मीने सरळ तिला मिठीच मारली.

‘‘अरेच्चा? पम्मी? एकटीच आलीस?’’

‘‘हो, परवा माझा इथे एका कंपनीत इंटरव्ह्यू आहे. शिवाय पुढल्या आठवड्यात अजून दोन इंटरव्ह्यू आहेत.’’

‘‘मामामामी बरे आहेत?’’

‘‘एकदम मजेत! वहिनी, अगं तू आठ दिवस त्यांच्याकडे राहून काय आलीस, आईबाबा तुझ्या प्रेमातच पडले आहेत. प्रत्येक बाबतीत तुझंच उदाहरण देतात.

‘सून असावी तर नमितासारखी’ असं प्रत्येकाला सांगतात. काय जादू केली आहेस गं त्यांच्यावर?’’ हसून प्रमिला म्हणाली. तिच्या प्रसन्न हसण्याकडे नमिता बघतच राहिली.

‘‘आता चहा वगैरे ठेवशील की स्वत:चं कौतुकच ऐकत बसशील?’’ आत आलेला भानू खेकसला तशी नमिता पटकन् चहाकडे वळली.

‘‘पम्मी, तू फ्रेश हो, तोवर चहा नाश्ता होतोय.’’ भानूने म्हटलं. तशी खालच्या आवाजात त्याला दमात घेत पम्मीने म्हटलं, ‘‘दादा, हाऊ रूड यू आर. ही काय पद्धत झाली बायकोशी बोलायची? लग्नाला अजून दोन महिनेच होताहेत.’’

‘‘पायातली वहाण पायातच हवी,’’ म्हणत भानू निर्लज्ज हसला.

प्रमिला स्नान करून येतेय तोवर नमिताने चहाचा थर्मास अन् स्टफ टोस्ट आणि खेकडा भजी तयार ठेवली होती.

‘‘वहिनी, अगं, किती फास्ट कामं करतेस तू? माझी अंघोळ होईतो इतकं सगळं तयारही केलंस?’’ कौतुकाने पम्मीने म्हटलं. स्वत:च्या बशीत तिने दोन टोस्ट अन् दोन तीन भजी घेतली अन् टोमॅटो सॉसबरोबर चव घेत मनापासून खाऊ लागली. ‘‘व्वा! मस्तच आहे हं! दादा, तू घे ना…’’

‘‘मला नको…काल दूध नासलं होतं त्याचंच काही तरी केलं असेल.’’

‘‘दादा, अरे, पनीर दूध नासवूनच तयार करतात. तुला ठाऊक नाही का?’’ पम्मीने म्हटलं.

‘‘घ्या ना हो, थोडं चाखून तर बघा,’’ नमिताने विनवणी केली.

‘‘छे:छे: शिळ्या वस्तूंपासून केलेले प्रकार मला आवडतच नाहीत,’’ तिरसटून भानूने म्हटलं.

‘‘तू ही ना दादा, अगदी आजोबांसारखाच आहेस. तुझे बाबाही असेच आठमुठे. जग बदललं पण हे बदलायला तयार नाहीत.’’

बोलता बोलता पम्मीने स्टफ टोस्टला सॉस लावून एक घास दादाच्या तोंडात कोंबलाच, नमिता थोडी घाबरूनच नवऱ्याची प्रतिक्रिया बघत होती. पण त्याला बहुधा चव आवडली अन् त्याने आपल्या हाताने आपल्या बशीत दोन टोस्ट अन् चार भजी वाढून घेतली.

दुसऱ्यादिवशी सकाळी आपलं सर्व आवरून प्रमिला भानूबरोबर इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडली. तिला तिथे सोडतानाच भानूने बजावलं होतं की इंटरव्ह्यू आटोपल्यावर फोन कर. मी घ्यायला येतो. कंपनी मोठी होती. उमेदवारही बरेच होते. प्रमिलाचा नंबर येईतो चार वाजले होते. प्रमिला इंटरव्ह्यू आटोपल्यावर सरळ रिक्षाने घरी पोहोचली अन् तिने भानूला फोन करून घरी पोहोचले हे सांगितलं. त्याच्याकडून भरपूर रागावूनही घेतलं.

‘‘कसा झाला इंटरव्ह्यू?’’ नमिताने विचारलं.

‘‘फारच छान झाला. पण वहिनी अजून तू सकाळच्या साडीतच आहेस? अगं, जरा आवरून जवळच्या पार्कांपर्यंत जाऊन येत जा. येताना भाजी, फळं, दूध वगैरे आणून टाकावं. बाहेर पडलं की लोकांशी ओळखी होतात. आता इथे तुझे सासूसासरे नाहीएत. दोघंच आहात. जरा मोकळेपणाने राहा ना?’’ नमिता म्हणाली.

‘‘नाही पम्मी, तुझ्या दादांना वाटतं मी गावंढळ आहे. ते मला सोसायटीतल्या बायकांत मिसळू देत नाहीत,’’ नमिताच्या डोळ्यांत बोलता बोलता पाणी तरळलं.

‘‘ते माझ्यावर सोपव…चल पटकन् कपडे बदल…थोडं भटकून येऊ.’’

‘‘अगं पण तुझे दादा?’’

‘‘तो कुठे सात वाजेतो येतोय.’’

‘‘पण त्यांना आवडणार नाही.’’

‘‘ते मी बघते. चल आवर पटकन्,’’ प्रमिलाच्या आग्रहाने पटापट आवरून नमिता व प्रमिला घराबाहेर पडल्या.

थोडं फिरून, थोडी भाजी घेऊन त्या घरी परतल्या तरी भानू आलेला नव्हता.

नमिताने सायंकाळी खाण्यासाठी कटलेट केले होते. भानू आल्यावर तिने खारी शंकरपाळी, चहा व कटलेट आणून टेबलवर मांडले…भानूने येताना समोसे व जिलेबी आणली होती.

‘‘कसा झाला तुझा इंटरव्ह्यू?’’ त्याने विचारलं.

‘‘फारच छान! सिलेक्शन होईल माझं. अजून दोन ठिकाणी इंटरव्ह्यू आहेत. त्या कंपन्याही चांगल्या आहेत. १५ दिवसांत सगळेच निकाल कळतील. पुढल्या महिन्यात जॉइन करावं लागेल. तोपर्यंत दादा, मी इथेच तुझ्या डोक्यावर बसणार आहे. वहिनीशी माझं छान जमतं. मी तुझ्याशीही जमवून घेईन,’’ मिश्किल हसंत प्रमिला म्हणाली.

भानूचं लक्ष नमिताकडे गेलं, ‘‘हे काय? तो खेकसला.’’

‘‘इतकी सुंदर साडी नेसून तू स्वयंपाकघरात वावरत होतीस? लॉण्ड्रीचा खर्च का वाढवते आहेस? साडी खराब होईल ना? महाग वस्तूंची काळजी घ्यावी लागते.’’

फिरून आल्यामुळे टवटवीत दिसणाऱ्या नमिताचा चेहरा खर्रकन उतरला. बायकोला कारण नसताना सतत रागावणाऱ्या या दादाचा प्रमिलाही राग आला.

नमिता पटकन् साडी बदलायला उठली, तिला हात धरून सोफ्यावर बसवत प्रमिला म्हणाली, ‘‘दादा, अरे सांडायला ती काय लहान बाळ आहे का? मुळातच तिचं काम अत्यंत व्यवस्थित आहे. छान साडी नेसून किती मस्त दिसतेए ती. एक सेल्फी काढूयात.’’ तिने भानूलाही नमिताच्या शेजारी बसवलं अन् नमिताच्या डोक्याला आपलं डोकं टेकवून छानसा सेल्फी घेतला.

‘‘बघ किती छान आलाय,’’ सेल्फी दाखवत तिने म्हटलं.

‘‘छान आहे…पण मला भूक लागलीए. मी समोसे खाणार?’’ म्हणत भानूने समोसा खायला सुरुवात केली. ‘‘तू खा.’’ त्याने पम्मीला खूण केली.

‘‘नंतर…आधी कुरकुरीत चविष्ट कटलेट खाणार. वहिनी फारच छान आहेत हं कटलेट. खरंच, आज आत्याबाई असायला हवी होती. तिलाही छान छान पदार्थ करायची, खायला घालायची अन् स्वत:ही खायची खूप हौस होती.’’

बायकोचं कौतुक सहन न होऊन भानूने विचारलं, ‘‘काय आहे हे?’’

‘‘मसूर डाळ, हरभरा डाळीचे कटलेट आहेत,’’ नमिता हळूच म्हणाली.

‘‘काहीही उद्योग करतेस. अगं डाळीला डाळीसारखंच वापर…मध्येच संपली तर मी पुन्हा आणून देणार नाही. बजेटचा विचार करत जा.’’

‘‘कालची डाळ थोडी उरली होती, त्यातच भाज्या, बटाटे वगैरे घालून नवा प्रकार केलाय.’’

‘‘दादा, न संतापता खाऊन बघ, समोशाची चव विसरशील.’’ प्रमिलाने दोनतीन कटलेट त्याच्या बशीत घातले.

त्याने ते खाल्ले हे बघून नमिता खूप सुखावली. त्याला कटलेट आवडले हे त्याच्या चर्येवरूनच कळत होतं.

‘‘वहिनीच्या हातात जादू आहे हे पटलं ना?’’ पम्मीने त्याला चिडवलं. तो हसला पण तोंडाने कबूल केलं नाही.

प्रमिलाचे दोन इंटरव्ह्यू आणखी झाले. निकाल समजायला आठदहा दिवस होते. हा काळ पम्मी अन् नमिताने खूप एन्जॉय केला. नमिताला पतीने बळजबरीने सलवार सूट घेऊन दिले. त्यावर मॅचिंग बांगड्या, अंगठ्या, ब्रोच, क्लचर्स अशाही बऱ्याच वस्तू प्रमिलाने नमिताला घेऊन दिल्या. एक सुंदरसा अॅप्रनही घेऊन दिला ज्यामुळे नमिताला स्वयंपाकघरात वावरताना सोयीचं व्हावं.

‘‘आता ही घरात सलवार सूट घालून वावरणार? अगं, थोरले काका काकू आले तर? तुला माहीत नाही, ते कसले कडक आहेत ते.’’

‘‘अरे, पण त्यांच्यासाठी वहिनीने सतत साडीत का वावरायचं? अन् इतका चांगला पोषाख आहे. अंगभर कपडे आहेत. पदरासारखी ओढणी आहे. हातपाय मोकळे राहातात. यात वाईट काय आहे? तू साडी नेसून दिवसभर राहा स्वयंपाकघरात, मग समजेल,’’ प्रमिलाने दादाला ऐकवलं.

‘‘जाण्यापूर्वी माझ्या बायकोला पूर्णपणे बिघडवून ठेवणार आहेस तू,’’ तिच्या पाठीत कृतक रागाने एक धपका घालत दादा म्हणाला.

‘‘तरी आभार मान माझे, नाही तर सरळ ‘जिन्स-टॉप’ किंवा ‘ट्राउझर-शर्ट’ घालायला लावले असते तिला. पण काही म्हण वहिनी, तुझी फिगर इतकी छान आहे की ट्राउझर किंवा जीन्समध्येही खूपच छान दिसशील तू.’’ नमिताकडे बघत प्रमिला म्हणाली.

प्रमिलाच्या येण्याने नमिताला खूपच आधार मिळाला होता. खरं तर ती नवी नवरी होती पण भानू कायम तिला टोचून बोलायचा. कौतुक कधीच करत नव्हता. नव्या घरात, नव्या वातावरणात तिरसट नवऱ्याबरोबर जमवून घेताना तिची दमछाक होत होती.

हे सगळं प्रमिलाच्याही लक्षात आलं होतं. तिला नमिताचे गुण लक्षात आले होते. तिच्यापेक्षाही वयाने लहान असणारी नमिता किती दबून राहाते. किती बावरलेली असते, हे बघून तिला वाईट वाटायचं.

भानूदादा नमिताला अजिबात वेळ देत नाही. सतत अपमान करतो, टोचून बोलतो हे सगळं बदलायला हवं. लग्न म्हणजे गुलामी नाही तर परस्पर प्रेम, सामंजस्य अन् सहकार्य, एकमेकांविषयीचं कौतुक अन् आदरही हे सगळं दादाला कळायलाच हवं.

‘‘वहिनी, तुझी ‘खानाखजाना’ सीरियल सुरू झालीय,’’ नमिताला हा कार्यक्रम आवडतो हे पम्मीला कळलं होतं. नमिता कार्यक्रम बघता बघता काही नोट्स घेत होती ते बघून तिने म्हटलं, ‘‘वहिनी, मी तुला कॉम्प्युटर शिकवते, गूगलवर तुला ढिगाने शेफ अन् त्यांच्या रेसिपीज भेटतील. तू ट्राय कर.’’

‘‘नको ग…बाई! कुठे काही चुकलं तर भानू ओरडतील,’’ घाबरून नमिताने म्हटलं.

‘‘काही होत नाही गं! ये…मी आहे ना तुझ्याबरोबर…’’ अन् मग सुरू झालं लेसन नं.१,…२…,३.

चार-पाच दिवसांनंतर नमिताने स्वत:च कबूल केलं, ‘‘उगाचच घाबरत होते मी.’’

‘‘हळूहळू अजूनही खूप काही शिकशील तू?’’ पम्मी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिच्या मोबाइलवर एसएमएस आला. वाचताच ती आनंदाने ओरडली,

‘‘वहिनी, मला नोकरी मिळाली. आठ दिवसांत मला रिपोर्ट करायला हवंय.’’ तिने नमिताला गरगर फिरवून सोफ्यावर बसवलं.

‘‘खरंच ग! किती आनंदाची बातमी आहे. खरंच, तुझ्या मेहनतीला फळ आलं,’’ नमिताने पम्मीच्या गालावर थोपटून शाबासकी दिली.

भानू घरी नसताना पम्मीने सोसायटीतल्या बायकांना दोन तीन ग्रुप्समध्ये दुपारी घरी चहाला बोलावून घेतलं. नमिताला छानछान पदार्थ करायला लावले.

नमिताच्या पाककलेने सगळ्याच खूष होत्या. चकितही होत्या. ही मुलगी इतकी हुशार अन् गुणी आहे हे त्यांना आता समजलं होतं. रोज सायंकाळी नमिता बाहेर जायची. त्यांच्या आपसात भेटीही व्हायच्या. नमिताने स्वयंपाकाच्या पाककृतींवर आधारीत टीव्ही कार्यक्रमांतून घरबसल्या बक्षींसही मिळवली होती. हल्ली तिचा आत्मविश्वास वाढला होता. नमिताला काळजी पडली होती की पम्मी गेल्यावर तिचं कसं होणार?

प्रमिलाच्या तल्लख मेंदूतून एक अफलातून आयडिया निघाली. तिच्या एका मैत्रिणीचा भाऊ चांगला लेखक आहे. त्याची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनेक चांगले प्रकाशकही ओळखीचे आहेत. जर त्यांची मदत घेतली तर? नमिताच्या रेसिपीजचं छानसं पुस्तक तयार होऊ शकतं.

तिने नमिताला सांगितलं, ‘‘मी जयंतला घरी जेवायला बोलावते. त्याच्याशी चर्चा करूयात. रविवारी रात्री.’’

‘‘पण पम्मी, भानू त्या दिवशी लखनौला जाताहेत, ते इथे नसणार.’’

‘‘मग तर छानच झालं. आपण दादाला सरप्राइज देऊयात. पुस्तक तयार झाल्यावरच त्याला दाखवू.’’

पम्मीने जयंतला फोन करून घरी जेवायला बोलावलं. नमिताची त्याच्याशी ओळख करून दिली. त्याच्याकडून कशा तऱ्हेच्या मदतीची अपेक्षा आहे हेही सांगितलं.

नमिताच्या हातचा स्वयंपाक खरोखरच खूप चविष्ट असतो, हे जयंतलाही लक्षात आलं, ‘‘वहिनी, तुम्ही तुमच्या रेसिपीज तुमच्या पद्धतीने लिहून मला द्या. त्यांना पुस्तकाच्या भाषेत मी व्यवस्थित बांधतो. आपण छान पुस्तक तयार करू,’’ जयंत म्हणाला.

 

‘‘जयंत, मी तर नावही शोधून ठेवलंय या पुस्तकासाठी. ‘सदैव खावे : ताजे अन् नवे,’ अरे, उरलेल्या अन्नापासून ताजा अन् नवा पदार्थ बनवण्याच्या १०० तरी पाककृती आहेत वहिनीजवळ. अन् अजून अशा तऱ्हेचं पुस्तक बाजारात आलेलं नाहीए,’’ पम्मी म्हणाली.

‘‘खरंच, कन्सेप्ट चांगला आहे. आयडिया नवी आहे. वहिनी, तुम्ही ८०-८५ रेसिपीज लिहून काढा. आपण त्यांचे छानसे फोटोही काढू. पुढलं काम माझं,’’ जयंत म्हणाला.

‘‘पदार्थ छान झाला आहे की नाही हे खाऊन ठरवण्याचं काम माझं,’’ पम्मी म्हणाली.

‘‘वहिनी, आता तुझं पुस्तक नक्की होतंय,’’ पम्मी व नमिताचा निरोप घेऊन जयंत निघून गेला.

भानूचे थोरले काका बरेच आजारी होते. म्हणून त्याला अधूनमधून लखनौला जावं लागत होतं. त्याच काळात जयंत त्याच्या ओळखीचा फोटोग्राफर नमिताकडे पाठवत होता. तिच्या रेसिपीजचे सुंदर फोटो तयार होत होते. गुपचुप पुस्तक तयार करताना खरं तर नमिताची भरपूर त्रेधा उडाली होती पण तिला मजा वाटत होती. हुरूप होता अन् आत्मविश्वास वाढला होता.

मधल्या काळात पम्मीचं ट्रेनिंग सुरू झालं होतं ,तिने कंपनीत जॉइन केलं होतं. अजून ती दादाच्या घरातच राहात होती. त्यातच लखनौवाले थोरले काकाकाकू पंधरा दिवस भानूच्या घरात राहून गेले होते. नमिताने अगदी आदर्श सुनेप्रमाणे त्यांची सेवाचाकरी केली होती. साडी, जोडवी, बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र, भांगातले कुंकू अशी गौरीसारखी नटून ती सकाळपासून कामाला लागत होती. तिच्या हातचे विविध पदार्थ खाऊन काकाकाकू तृप्त अन् खूष झाले होते. काकू अन् काका एरवी फार खडूस म्हणून प्रसिद्ध होते पण नमिताचं मात्र ते मनापासून कौतुक करायचे. फारच गुणी अन् संस्कारवान सून आहे म्हणायचे. त्यामुळे भानूही सुखावला होता.

काकूंचा जाण्याचा दिवस जवळ आला असतानाच पम्मीला ट्रेनिंग संपवून जॉब सुरू करण्याचा आदेश मिळाला. तिला राहाण्यासाठी कंपनीकडून घरही मिळालं होतं. तेवढ्यात जयंतचा फोन आला. तो पुस्तकांचा गठ्ठा घेऊन त्यांच्याकडेच येत होता.

जयंत घरी आला तेव्हा भानू घरीच होता. पम्मीने त्याची ओळख करून दिली. त्याच्या हातातला पुस्तकांचा भारा बघून भानूने हे काय आहे असं विचारलं.

‘‘बघा बरं तुम्हीच,’’ म्हणत नमिताने एक पुस्तक त्याच्या हातात दिलं. सुंदर रंगीत, आकर्षक मुखपृष्ठ, ‘सदैव खावे : ताजे अन् नवे’ लेखिकेचे नाव : नमिता भानूदास गोरे..चकित झाला भानू…आश्चर्याने नमिता, जयंत आणि पम्मीकडे बघत होता. जयंतने एक पाकिट नमिताला दिलं. ‘‘उघडून बघा,’’ म्हणाला. उघडल्यावर त्यातून नमिताच्या नावाचा प्रकाशकाने दिलेला २० हजार रुपयांचा चेक निघाला.

‘‘दादा, कसं आहे पुस्तक? ‘सदैव खावे ताजं अन् नवे…’ वहिनीच्या हातच्या पदार्थांचं कौतुक तर काकाकाकूंनी केलंच आहे. विशेष म्हणजे पुस्तकाची प्रस्तावना तुझ्या बॉसच्या बायकोने लिहिली आहे. ती फॅन आहे वहिनीची.’’ पम्मीच्या या वाक्याने तर भानूची विकेटच गेली. नमिताने वाकून नमस्कार करत पुस्तकाची एक प्रत काकाकाकूंना दिली. सगळेच खूप आनंदात होते. जयंतला त्यांनी जेवायला थांबवून घेतलं. नमिताने छानसा स्वयंपाक केला होता. जेवणं आनंदाने पार पडली.

‘‘खरं श्रेय पम्मीला आहे. तिच्यामुळेच मी हे सगळं करू शकले. जयंतनेही खूप मदत केली. अन् भानू तुमचंही सहकार्य मोलाचं होतं. तुमच्या क्रिटिसिझममुळेच माझे पदार्थ परफेक्ट होतात,’’ नमिताच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं.

हे बंध रेशमाचे

कथा * सुवर्णा पाटील

‘‘अरे तन्मय काय सुरू आहे तुझे? किती वाजले बघितले का? आता बंद कर तो मोबाईल आणि झोप आता.’’ आईच्या आवाजाने तन्मय त्याच्या मोबाईलच्या विश्वातून बाहेर आला.

‘‘हो ग आई, झालेच काम, तू झोप ना, तू का जागी आहेस. तुला सकाळी लवकर उठायचे असते ना…तू झोप मी पण झेपतच आहे आता.’’

आई तिच्या खोलीत गेली ही खात्री होताच तन्मयने पुन्हा मोबाईलवर चॅटिंग सुरू केली. उशिरा रात्रीपर्यंत मोबाईलवर चॅटिंग करतो म्हणून तुम्ही तन्मयबद्दल गैरसमज करू नका. नामांकित आयआयटी कंपनीत एका चांगल्या पदावर कार्य करणारा तन्मय एक हुशार व तितकाच हँडसम असा युवक आहे. त्याला कॉलेज जीवनापासून मित्र बनवायला खूप आवडते. त्याचे कॉलेजातील मित्रमंडळ पण खूप मोठे होते. पण जॉब लागल्यावर प्रत्येकजण आपल्या वाटेला गेला. आता फक्त भेट होते ती हाय हॅलो पुरतीच. असेच एक दिवशी फेसबुकवर त्याला एक मैत्रीण भेटली…अबोली. तसे व तिने तिच्या प्रोफाइलवर तिचा फोटो ही लावलेला नव्हता. होते फक्त एक अबोलीचे सुंदर फूल…

तन्मयची तिच्याशी छान गट्टीच जमली होती. त्याच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट तो तिच्याशी शेअर करायचा. कधी ऑफिसच्या कामामुळे तो अपसेट झालेला असला तरी त्या गोष्टी पण तिच्याशी बोलायचा. अबोली त्याला खूपच छान समजून घ्यायची. जर ती ऑनलाइन नसली तर तो अस्वस्थ व्हायचा. कारण तिच्याशी बोलण्याचे त्याच्याकडे दुसरे माध्यमच नव्हते. एकेदिवशी याच कारणावरून तन्मय अबोलीशी भांडला.

‘‘आपण आता किती छान मित्र झालो आहोत. तुला माझ्यावर विश्वास नाही का? मग तू मला भेटण्याचे का टाळत आहे. मला तुला प्रत्यक्ष भेटायचे आहे. तुझ्या डोळ्यांत डोळे मिसळून संवाद साधायचा आहे.’’

‘‘सॉरी तन्मय…हे आपण आधीच ठरवले होते की आपली मैत्री ही नेहमी ऑनलाइनच असेल. आपण एकमेकांना न पाहता मैत्री केली मग आता तू इतका का रागवलेला आहे?’’

‘‘हो मान्य आहे मला. पण कधी कधी तू ऑनलाइन नसते तेव्हा मला काय करावे हे सुचतच नाही. खरं सांगू का अबोली..मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय.’’

‘‘…तन्मय…’’

‘‘काय झाले अबोली? रागावली का माझ्यावर…पण मी तरी काय करू, प्लीज भेटायचे ना आपण…बोल ना…तुझे मुकेपण मला अजूनच अस्वस्थ करत आहे.’’

पण तन्मयच्या या वाक्याने अबोली ऑफलाइन झाली. तन्मयला समजलेच नाही तिला नेमके कशाचे वाईट वाटले. आजपर्यंत ती एकदाही अशी वागली नव्हती. उद्या बोलू असा विचार करून तो झेपण्याचा प्रयत्न करू लागला. पण अबोलीच्या ऑफलाइन गेल्याने त्याची झोपच उडवून टाकली होती. दुसरा दिवस उगवला पण दिवसभर अबोलीचे ऑफलाइन राहणे त्याला अस्वस्थ करत होते. तो उतावळेपणाने रात्रीची वाट पाहू लागला कारण काहीही असो अबोली रात्री आपल्याशी नक्की बोलेल याची खात्री होती. पण रात्री नेहमीची वेळ निघून गेली तरी अबोली ऑनलाइन आलीच नाही. तन्मयला खूप वाईट वाटले की आपण उगाच तिच्याशी भांडलो. आपण का तिला पाहण्याचा हट्ट केला. ती याच कारणाने रागावली असेल. त्याला स्वत:वरच खूप संताप येत होता पण त्यावर तो काहीही करू शकत नव्हता.

अबोलीची वाट पाहत पाहत एक महिना होऊन गेला. तन्मय दररोज रात्री नेहमीच्यावेळी ती ऑनलाइन येण्याची वाट पाहत असे…पण…तसे घडलेच नाही. त्याला आठवले की अबोलीचा उद्या वाढदिवस आहे आणि चॅटिंग करत असताना तिने सांगितले होते की तिला लहान मुले खूप आवडतात. त्याने ठरवले उद्या अबोलीसाठी काहीतरी वेगळे करू या. ती सोबत नसली तरी काय झाले?

दुसऱ्या दिवशी तन्मय सकाळी लवकर उठला. त्याने ऑफिसमध्ये रजा घेतली. तो एका मिठाईच्या दुकानात गेला. तिथून खूप सारे लहान मुलांना आवडणारी मिठाई घेतली व त्याच घराजवळ असलेल्या अनाथ आश्रमात गेला. पण गेटजवळ जाताच तो थबकला. समोरील दृश्य पाहून तो पाहतच राहिला.

सर्व लहान मुले एका तरूणी भोवती किलबिलाट करत होते. ते सर्वजण काहीतरी खेळ खेळत होते. ती तरूणी हावभाव करून त्यांना सांगत होती व ती मुले गाण्याचे नाव ओळखत होती. मुलांनी गाणे बरोबर ओळखल्यावर ती आनंदाने उड्या मारत होती आणि तोच आनंद, निरागसता त्या तरूणीच्या चेहऱ्यावर होती.

मोठी माणसे पण लहान मुलांसारखे निरागस असू शकतात का? हे कोडे तन्मयला पडले. हावभाव करतांना तिच्या गुलाबी ओठांची होणारी नाजूक हालचाल, वाऱ्याने उडणारे तिचे लांबसडक केस आणि ते सावरताना तिची होणारी धांदल…आपण इथे कशासाठी आलो हेच नेमके तन्मय विसरून गेला.

‘‘हॅलो मिस्टर, काय सुरू आहे?’’

एका लहान मुलाच्या आवाजाने तन्मय भानावर आला.

‘‘हम्मम…मी…ते…भेटायला आलो होतो.’’

‘‘हो का, मग भेटण्यासाठी गेटच्या आत यावे लागेल ना…तुम्ही तर केव्हाच गेट पकडूनच उभे आहात?’’

एवढ्याशा लहान मुलाने आपली फिरकी घ्यावी हे पाहून तन्मय थोडा रागावला. पण काय करणार. ती युवती व सर्व बच्चे कंपनी आता आपल्याकडेच पाहत आहे हे लक्षात आल्यावर तो म्हणाला, ‘‘नाही रे बेटा…तुम्ही सगळे खेळत होता ना, मग तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून थांबलो होतो.’’

‘‘हो का…आम्हाला माहिती आहे तुम्ही का थांबला होता? आणि तुमचे लक्ष कुठे होते?’’

तन्मय एकदम गोरामोरा झाला. या लहान मुलाने आपली चोरी पकडली म्हणून तो काही त्याला बोलणार तेवढयात समोरून एक वयस्कर गृहस्थ आले. त्यांनी त्या लहान मुलास बोलवले…‘‘’अजय इकडे ये…काय करतो आहे…आणि त्या दादाला काय त्रास देत आहेस?’’

‘‘नाही…नाही…मी काहीच केले नाही, उलट हा दादाच केव्हापासून…’’

आपली चोरी पकडली या भीतीने तन्मयने पुढे जाऊन त्या लहान मुलांचे म्हणजे अजयचे वाक्य पूर्ण केले. ‘‘नाही…याने मला काहीच त्रास दिला नाही. उलट तो मला आश्रमाबद्दल माहिती देत होता. खूपच हुशार आहे हा…’’ अजयही तन्मयकडे पाहून हसू लागला व खेळायला पळाला. पण त्याचवेळी तन्मयचे लक्ष त्या युवतीकडे गेले. त्या युवतीच्या नजरेनेही तन्मयची दखल घेतली हे त्याला जाणवले. तो तिकडे वळणार तेवढ्यात त्या गृहस्थानी त्याला ऑफिसमध्ये नेले.

‘‘नमस्कार मी धनंजय मोरे…सर्व जण मला गोरे काका म्हणतात. काय काम होते आपले?’’

तन्मयने त्यांना सांगितले की, ‘‘आज माझ्या एका मैत्रीणीचा वाढदिवस आहे म्हणून इथल्या लहान मुलांना खाऊ वाटायचा आहे आणि त्यांच्या शिक्षणासाठी काही मदतही करायची आहे.’’

‘‘अरे वा…छान…तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. मी सर्व मुलांना ग्राउंडवर बोलावतो…’’

‘‘मोरे काका, एक विचारू का?’’

‘‘हो…हो…विचारा ना…काही अडचण आहे का?’’

‘‘नाही अडचण अशी नाही. त्या मुलासोबत बाहेर खेळत आहे त्या कोण आहेत?

इथं कामाला आहेत का…’’ थोडे अडखळतच तन्मयने विचारले.

‘‘नाही…नाही…ती होय…ती आनंदी आहे.’’

‘‘म्हणजे मी नाही समजलो…’’

‘‘अहो तिचे नाव आनंदी आहे. तिला या निष्पाप मुलांचा खूप लळा आहे. ती त्यांना नेहमी भेटायला येते आणि आज तर तिचाही वाढदिवस आहे मग काय आजचा पूर्ण दिवस ती या मुलांसोबतच घालवते…मुलांनाही तिचा खूप लळा आहे. पण बघा ना एवढी सुंदर निरागस असूनही…’’

त्यांचे पुढचे वाक्य अपूर्णच राहिले. एक लहान मुलगी आली व त्यांना हात ओढत बाहेर घेऊन गेली. मीही त्यांच्या मागे मागे गेलो ग्राऊंडवर सर्व लहान मुले जमली होती. त्या सुंदर युवती म्हणजचे आंनदीच्या बर्थडेचे सेलेब्रशन सुरू होते पण एका वेगळ्याच पद्धतीने…आंनदीने आश्रमातील सर्व लहान मुलांचे औक्षण केले व त्यांना गोड खाऊ व एखादे गिफ्ट देत होती. माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहून मोरे काकांनी सांगितले की, ‘‘या लहान मुलांचा वाढदिवस कधी आहे हे आम्हाला ही ठाऊक नाही. पण त्या आनंदापासून ते अलिप्त राहू नये म्हणून आनंदी या पद्धतीने तिच्या वाढदिवशी त्यांना हा आनंद देते.’’

‘‘खूप छान आहे ही कल्पना…आजच्या काळातही कोणी इतरांचा विचार करत असेल असे मला वाटलेच नव्हते. शी इज रिअली ग्रेट..मी त्यांच्याशी बोलू शकतो का?’’

तन्मयच्या या प्रश्नाने मोरे काका दु:खी झाले.

‘‘काय झाले काका? मी काही चुकीचे बोललो का?’’

‘‘नाही रे बाळा…तू आनंदीशी बोलू शकतो…पण…ती तुझ्याशी नाही बोलू शकत. कारण आनंदी मुकी आहे. एका भयंकर अपघातात तिने आपले आईवडिल व आपला आवाज दोघेही गमावले. आज जो तू तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहत आहे तो फक्त या मुलांमुळेच…ही मुले तिचे सर्वस्व आहेत…’’

हे ऐकून तन्मयला खूपच मोठा धक्का बसला. त्याला एकदाही आनंदीकडे पाहून या बाबीची जाणीव झाली नाही. आधी तो फक्त तिच्याकडेच आकर्षित झाला होता. पण आता त्याला तिच्याबद्दल प्रेम व आदरही वाटू लागला. तन्मय मोरे काकासोबत आनंदीकडे गेला. काकांनी त्या दोघांची ओळख करून दिली.

तन्मयने आनंदीला विचारले की, ‘‘तुम्हाला राग येणार नसेल तर…मीपण तुमच्या या सेलेब्रशनमध्ये येऊ का?’’

तन्मय आश्रमात आल्यापासून आपल्याकडेच बघत आहे हे आनंदीला जाणवलंच होते व त्याचे व्यक्तिमत्त्व आश्रमातील मुलांविषयीची कणव…त्याच्या चेहऱ्यावरील गोड हास्य..आनंदी त्याला नाही म्हणूच शकली नाही. तिच्या संमतीने त्यानेही त्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याचा तो दिवस खूपच छान गेला. त्या भेटीत त्याने आनंदीकडून तिचा फोन नंबरही मिळवला. रात्री घरी आल्यावरही तो एकदम छान मूडमध्येच होता. आनंदीच्या आठवणीने तो गालातल्या गालात हसतही होता. आज बऱ्याच दिवसानंतर त्याच्या आईने त्याला इतके आनंदी पाहिले होते.

‘‘काय रे तन्मय…आज एकदम रंगात आहे गाडी…कोणी स्वप्नातली परी भेटली की काय तुला?’’

आईच्या या प्रश्नाने तो एकदम भांबावून गेला.

‘‘काय गं आई…काहीही बोलत असते. मी झोपायला चाललो आहे तू ही लवकर झोप.’’

पण हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे, हे आईच्या नजरेतून सुटले नव्हते.

तिकडे आनंदीची स्थितीपण काही वेगळी नव्हती. तन्मयचे बोलणे, त्याचे तिला सांभाळून घेणे, मुलांशी केलेली दंगामस्ती…तिला राहून राहून आठवत होती आणि विशेष म्हणजे त्याने एकदाही ती मुकी आहे हे तिला जाणवू दिले नाही. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव वरूनच तो तिचे म्हणणे समजून घेत होता…जसे की ते दोघे खूपच जुने मित्र आहेत.

दुसऱ्या दिवसापासून तन्मय आणि आनंदीचे नवे जग सुरू झाले. एकमेकांना मोबाइलवर मॅसेजेस केल्यावाचून त्यांचा दिवच सुरू व्हायचा नाही. मग हे चॅटिंग छोट्या भेटीतून..प्रेमात कधी परावर्तित झाले दोघांनाही कळले नाही पण…

हो पण…आनंदीला भीती होती ज्या यक्तिवर ती मनापान प्रेम करते…ती व्यक्ती तिच्यापासून कायमची दूर जाते आणि तिला तन्मयला गमवायचे नव्हते म्हणूनच ती तिचे प्रेम व्यक्त करत नव्हती. पण तन्मय आता आनंदीशिवाय राहू शकत नव्हता. तो त्याच्या आईशी या विषयावर बोलला होता. तिलाही हे नाते मान्य होते मग काय तन्मयने त्याच दिवशी आनंदीला लग्नाचे विचारायचे ठरवले. ते दोघे संध्याकाळी एका बागेत भेटणार होते.

संध्याकाळी तन्मय नेहमीपेक्षा लवकरच तिथे आला. आनंदी येताच तो आतुरतेने तिला म्हणाला, ‘‘काय गं किती उशीर…पण तिच्या चेहऱ्यावरील खट्याळ हसू पाहून त्याला स्वत:ची चूक लक्षात आली. हम्मम समजले मला मीच आज जरा लवकर आलो. ते जाऊ दे, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. तू पूर्ण ऐकूण घे, तुझा निर्णय असेल तो मला मान्य आहे. बोलू…’’

तन्मयीची अधीरता पाहून आनंदीला लक्षात आले होते की त्याला का म्हणायचे आहे. तिने होकार दिला.

‘‘आनंदी…तू मला किती आवडतेस हे मी तुला सांगत नाही कारण न बोलताही तू हे जाणतेस पण मी आता तुझ्याशिवाय नाही राहू शकत…पण त्याच्याही आधी मला तुला अजून एक सांगायचे आहे. तू गैरसमज करू नको, आपली भेट होण्यापूर्वी माझे एका मुलीवर प्रेम होते.’’

हे ऐकून आनंदीच्या चेहऱ्यावरील भाव एकदम बदलून गेले.

‘‘थांब…आनंदी गैरसमज करू नको पूर्ण गोष्ट एक…अबोली…अबोली तिचे नाव…आम्ही ऑनलाइन भेटलो होतो. मी प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करायचो. तिला न पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. अगं हे तिला माहिती नव्हते. पण अचानक एके दिवशी ती माझ्या आयुष्यातून निघून गेली…काहीही न सांगता…’’

हे ऐकल्यावर आनंदी रडू लागली. तन्मयला वाटले की, आपले प्रेम प्रकरण ऐकून तिला वाईट वाटले. पण हे वेगळेच कारण होते. आनंदीने रडत रडतच आपला फोन तन्मयला दाखवला त्यात तिचे अबोली या नावाने फेसबुकवरील अकाउंट पाहून तर तो आश्चर्य चकित झाला ते ओपन करून त्यातील त्याचे व अबोलीचे चॅटिंग पाहून त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्यचे भाव रागात बदलले.

‘‘का केले तू हे…अबोली…की आनंद…तुझ्या त्या अचानक जाण्याने मी किती कोलमडून गेलो होतो माहिती आहे का तुला, मग पुन्हा का आली माझ्या आयुष्यात…पुन्हा माझ्या भावनांशी खेळायला…का केलेस असे…’’

आनंदी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण आता यावेळी शब्दविना ती त्याचा गैरसमज दूर करू शकत नव्हती आणि तिचे भाव त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हते. तन्मय रागाने तिथून निघून गेला. आपण आनंदीला एकटेच बागेत सोडून आलो याचेही त्याला भान नव्हते. फक्त एकच, डोक्यात होते अबोली की आनंदी आणि का…आणि याच विचारात त्याची वेगाने चालणारी गाडी केव्हा समोरील मोठ्या झाडास धडकली त्याला समजलेच नाही. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्याच्या मित्रांनी आनंदीच्या घरी फोन        केला ही बातमी ऐकताच आनंदीला खूपच मोठा धक्का बसला. आपल्या आईवडिलांचा अपघात तिच्या नजरेसमोर आला…आणि त्याच धक्क्याने ती जोरात किंचाळली व बेशुद्ध झाली. तिच्या मावशीने तिला शुद्धीत आणले व दोघीही तन्मयला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आल्या. तिथे त्याची आई होती. आनंदीने त्यांना प्रेमाने जवळ घेतले.

‘‘काळजी करू नका…आपल्या तन्मयला काहीही होणार नाही…’’

‘‘तू आनंदी ना…तू तर…तो तुलाच भेटायला आला होता ना…’’

तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी सांगितले की तन्मय आता शुद्धीत आला आहे. कोणीही एकजण त्याला भेटू शकतो. आनंदीने तन्मयच्या आईकडे पाहिले. त्यांनीही तिच्या डोळ्यातील प्रेम पाहून तिला परवानगी दिली.

आनंदी तन्मयच्या रूममध्ये गेली. तिला पाहताच तन्मयने तोंड फिरवले पण आनंदी त्याच्याजवळ गेली. तिने त्याचा हात हातात घेतला. ‘‘इतके रागावताता का आपल्या माणसावर…’’

तिचे शब्द ऐकून तन्मय तिच्याकडेच पाहतच राहिला.

‘‘हो मी बोलू शकते. केवळ तुझ्यामुळेच एक अपघाताने माझी वाचा गेली आणि दुसऱ्या अपघाताने परत आली. मीही तुझ्यावर खूपच प्रेम करते. मला माहित नव्हते की फेसबुकवर चॅटिंग करणारा तूच आहेस. मीही तुझ्यात गुंतत होते पण तू त्यावेळी भेटण्यासाठी आग्रह करत होता म्हणूनच मी तुझ्यापासून दूर झाली होती. पण आपण पुन्हा भेटलोच…आणि पुन्हा कधीही माझ्यापासून दूर करणारा नाही. नेहमी…असेच…’’

‘‘हो..का…नेहमीच असेच…म्हणजे कसे?’’

तन्मयच्या या खट्याळ वाक्याने आनंदी लाजली व तिचा हात त्याच्या हातातून सोडवू लागली पण तन्मयने त्याची पकड अधिकच घट्ट केली. मॅडम आता कुठे चालल्या पळून…आता हे रेशमाचे बंध कायमचेच विणले गेले. त्यातून तुमची सुटका नाही.

‘‘मलाही आवडेल हे बंधन कायमस्वरूपी…’’ आणि हीच तर खरी सुरूवात आहे आपल्या राजा राणीच्या संसाराची…नांदा सौख्य भरे…!!!

राधा ही बावरी

कथा * रेखा नाबर

‘‘पकडा पकडा माझी पर्स खेचली.’’

स्कूटरवरून चाललेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या तरूणाने राधाची पर्स खेचली. ती मदतीसाठी पुकारा करीत होती. कारमधून येणाऱ्या माधवने गती वाढवून आपली कार स्कूटरच्या समोर उभी केली. पटकन् उतरून त्याच्या हातातली पर्स खेचून घेतली व त्याला एक फटका लगावला. त्या दोघांनी पोबारा केला. माधव पर्स घेऊन राधाजवळ आला. ती खूप घाबरली होती.

‘‘ही घ्या तुमची पर्स. आतल्या वस्तू नीट तपासून घ्या.’’

‘‘थँक्स. मी रिक्षासाठी इथे थांबले होते. तर हा प्रकार घडला.’’

‘‘मिळाली ना पर्स! रिक्षासाठी नका थांबू. मी सोडतो तुम्हांला गाडीने. पत्ता सांगा तुमचा.’’

‘‘नको नको. मिळेल मला रिक्षा. जाईन मी. तुम्हांला कशाला त्रास?’’

‘‘भीती वाटते की काय, मी तुम्हांला पळवीन अशी. तशी काळजी करू नका. पण इथे थांबलात तर झाल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ शकते.’’

ती घाबरून ‘नको नको’ म्हणाली. त्याला हसू आले. तो गाडीच्या दिशेने चालू लागला व ती मागून तिने पत्ता सांगितला. गाडी सुरू झाली.

‘‘झाल्या प्रकाराने तुम्ही घाबरलाय. आपण कॉफी घेऊ या एखाद्या चांगल्या हॉटेलात.’’

‘‘नको नको. उशीर होईल. घरी सगळे वाट पाहत असतील.’’

‘‘मोबाईल वापरता ना? मग कळवा घरी. नाहीतर माझ्या मोबाईलवरून फोन करा.

बाय द वे माझं नाव माधव.’’

‘‘माझं राधा. मी करते मेसेज.’’

‘‘काय हो राधा मॅडम, पहिल्यांदा नको नको म्हणून नंतर राजी व्हायचं अशी कार्यपद्धती आहे का तुमची?’’

ती खुद्कन हसली व तिच्या गालावरची कळी त्याला खुणवू लागली.

कॉफीपानानंतर त्याने राधाला घरी सोडले. त्याचा मोबाईल नंबर न घेतल्याची तिला चुटपूट लागली. पण दोनच दिवसांनी तो तिच्या बँकेत आला. मनांत विचार आले ‘हा मलाच भेटायला आला की काय? पण मी या बँकेत काम करते हे त्याला कुठे माहिती आहे. सहज आला असेल कामानिमित्त, न बोलता जायला लागला तर झटकायचं त्याला. आधीच आगाऊपणा नको,’ इतर कस्टमरसारखं तो. मला त्याचं अप्रूप कशाला?

असे विचार मनांत आले तरी नजर त्याचा पाठपुरावा करीत होती. तो मॅनेजर पेंडसेंच्या केबिनमध्ये गेला.

‘‘हूं. म्हणजे पेंडसे साहेबांकडे काम आहे तर. मग तिकडूनच जाईल स्वारी. आपण आपलं काम करावं.’’

त्याने केबिनमध्ये शिरताना राधाच्या दिशेने नजर टाकली.

ती माझ्याकडे पाहतेय की भास झाला? मुलींच्या अथांग मनाचा पत्ता लागणं महाकठीण. माधव, आगे बढ़ो.

‘‘एक्स्युज मी. राधा जोशी मॅडम.’’

तिने पटकन् वर बघितले तर तो आणि पेंडसे सर. ती चटकन् उठून उभी राहीली. ‘‘येस सर.’’

‘‘रिलॅक्स. हे माधव आपटे. यांच्या कंपनीचा अकाऊंट आहे आपल्याकडे. त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. सगळे अपडेटस् पाठवतो मी तुमच्या ई-मेलवर.’’

ती दबकन् प्रतिसाद देण्याचे विसरून गेली.

‘‘अहो जोशी मॅडम काय झालं? रिलॅक्स. कराल का तुम्ही हे काम?’’

भानावर येत तिने प्रतिसाद नोंदवला. ‘‘ये.ये..स.स.सर.’’

‘‘रिलॅक्स मॅडम. थँक्यू. तुम्ही बसा माधव आपटे.’’

पेंडसे साहेब निघून गेले. ‘‘नक्की. बसू ना?’’

‘‘बसा की. साहेबांनी सांगितलं ना?’’

‘‘पण तुम्ही नाही सांगितलंत.’’

‘‘आता सांगते फ्लिज बसा आणि मला डिटेल्स द्या.’’

हिला माझं येणं आवडलं नाही म्हणून जुलमाचा रामराम का? माझं काम करायचं नाहीए वाटतं! की मला टाळायला पाहतेय.

त्याने शांतपणे बसून डिटेल्स दिले.

‘‘निघू का? परत कधी येऊ?’’

‘‘अं..अं. या दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी.’’

तो निघाला. किती कोरडं वागणं हे? चहा कॉफी विचारलीसुद्धा नाही. परत यायचं का? काम काय कोणाकडूनही करून घेता येईल. काम होतं तर डायरेक्ट माझ्याकडे यायचं ना? मध्ये पेंडसेसर कशाला? रागच आला मला. म्हणूनच चहा, कॉफी विचारली नाही. येईल की नाही दोन दिवसांनी?

‘‘या या बसा. पाणी प्या. उशीर झाला ना फार?’’

‘‘वाट पाहत होता ना माझी?’’

‘‘तसंच काही नाही. पण काम लवकर हातावेगळं झालेलं बरं.’’

कसं सांगू सकाळपासून वाट पाहत होते ते.

‘‘हो. ते तर झालंच पाहिजे.’’

हे आपलं सांगण्यापुरतं. ही वाटच पाहत होती माझी.

‘‘हा रिपोर्ट मी तयार केलाय. एकदा नजरेखालून घाला. तोपर्यंत मी कॉफी मागवते.’’

‘‘अरे व्वा! न विचारताच कॉफी? बरीच प्रगतीझालीय बच्चू.’’

‘‘बरं झालं. वेळेत काम आटपलं. आता निघू या का?’’

‘‘हो हो. तुम्ही घरीच जाणार ना? सोडतो तुम्हांला.’’

‘‘आलं लक्षात. याचसाठी उशीर केला होता तर.’’

‘‘चालेल.’’

‘‘रिक्षाने गेला असता तर जास्त वेळ लागला असता ना, तेवढा वेळ आपण ग्राऊंडला राऊंड मारून घरी जाऊ या का?’’

‘‘हरकत नाही. पण फार उशीर नको.’’

‘‘म्हणजे याला माझा सहवास हवासा वाटतो. ग्रेट.’’

‘‘इकडे पाणीपुरी खूप छान मिळते. स्वच्छही आहे. घेऊ या.’’

‘‘नको. मी रस्त्यावर कधी काही खात नाही.’’

‘‘मग आता कर सुरूवात. सॉरी करा सुरूवात.’’

‘‘नाही. अगं म्हटलेत तरी चालेल.’’

‘‘घोडं पुढे दामटतोय वाटतं?’’

‘‘सेम हियर. अरे म्हटलस तर खूप आवडेल. म्हणजे जवळीक वाढते ना?’’

‘‘काय म्हणालात?’’ स्वर ताठर वाटला.

‘‘तसं नाही. मोकळेपणाने बोलणं होतं. म्हणून म्हटलं.’’

‘‘खरंय अगं आणि अरे. दोघेही हसले.’’

दिवस पुढे सरकत होते. सहवास वाढत होता. एकत्र फिरणे, नाटक, सिनेमा चालू झाले. दोनो तरफ आग बराबर लगी थी.

मित्रमैत्रिणीत चिडवाचिडवी चालू झाली.

‘‘माधव, आपण असंच किती दिवस हिंडत फिरत राहायचं? एकमेकांत गुंतला आहोत. घरच्यांना सांगायला पाहीजे ना? माधवच्या अंत:करणाचा कोपरा ठुसठुसला. राधाच्या सहवासाने मी सुखावतो. मग ही जुनी आठवण मनाच्या पृष्ठभागावर येऊन का तरंग उठवतेय? आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आमचा भविष्यकाळ भूतकाळाने झाकोळला जाणार नाही ना? सांगावा का तिला भूतकाळ? एक दिवस आईने अचानक विषयाला तोंड फोडले.’’

‘‘माधवा, एका तरूण मुलीबरोबर काही जणांनी तुला बघितलं. म्हणजे बागेत, थिएटरमध्ये. तुला कोणी पसंत पडली असली तर सांग. मला सूनमुख बघायची घाई झाली आहे.’’

माधव क्षणभर गांगारला.

‘‘हो…हो…आ…ई…खरं आहे ते. पण मला काही कळत नाहीए.’’

‘‘कळायचय काय त्यात? जुळतायत ना तुमचे स्वभाव? मग करू या लग्न. सुरूवातीला थोडं अवघड वाटेल. भूतकाळ लवकरात लवकर मागे टाकायला हवा आणि भविष्याकडे कूच करायला हवी. गुंतलाय ना तुम्ही एकमेकांच्यात?’’

‘‘आई, तुला कोणी सांगितलं?’’

‘‘आई आहे मी तुझी. ओळखणारच ना! लग्न करायचय ना तिच्याशी? घेऊन ये तिला घरी. मग तिच्या आईवडिलांना भेटू. त्यांना माहिती आहे का?’’

‘‘बहुतेक असेल माहिती. रविवारी बोलावूं का?’’

‘‘हो बोलव ना! शुभस्थ शीघ्रम.’’

रविवारपर्यंत तो तीव्र मानसिक आंदोलनातून जात होता. कधी एकदा रविवारची संध्याकाळ येते असं त्याला झालं होतं. अखरे ती वेळ आलीच. गुलाबी रंगांची साडी, तसाच ब्लाऊज, पोनीवर अबोलीचा गजरा घातलेली राधा आली, तेव्हा ती साक्षात परी असल्याचा त्याला भास झाला. तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होता व लाजेने तिचे गाल आरक्त झाले होते.

‘‘घर सापडायला त्रास नाही ना झाला?’’

‘‘नाही मावशी. आधी आले…’’

तिचे बोलणे तोडून आई म्हणाली, ‘‘हां तेच. आधी आली नाहीऐस ना!’’

‘‘हो हो.’’

आईच्या वागण्याने माधव संभ्रमात पडला. तो संभ्रम वाढला जेव्हा सुशिला मावशी व सुधाकर काका म्हणजे आईची मैत्रिण व तिचे यजमान आले.

‘‘आं. तुम्ही आता कसे?’’

‘‘म्हणजे तुमच्याकडे येण्याचं काही वेळापत्रक आहे का?’’

‘‘नाही…तसं…नाही. पण आता. आई सांग ना.’’

‘‘माधवा, मुलाबरोबर तिचे आईवडिल नकोत का?’’

तो जोरात किंचाळला, ‘‘काय? राधा सुशिला मावशीची मुलगी?’’

‘‘प.ण.ती. पिंकी? जिच्याशी लग्न कर म्हणून तू धोशा लावला होतास.’’

‘‘पिंकी म्हणजेच राधा म्हणजेच पिंकी.’’ वडिलांचे समर्थन.

‘‘हो…हो..पण मला माहिती नव्हतं ना!’’

‘‘काय फरक पडतो? तुम्ही प्रेम केलेली व्यक्ति तीच आहे ना?’’ सुशिल.

‘‘खरंय ते. पण पूर्वी आई म्हणत होती. आई, सांग ना तू.’’

‘‘सांगते भावोजी. मीराच्या आठवणीतून हा बाहेरच पडत नव्हता. कुठल्याही मुलीचा फोटोसुद्धा पाहायला तयार नव्हता.’’

‘‘घोर निराशा झाली माझी जेव्हा मीरा अचानक अमेरिकेला निघून गेली. कॉलेजपासून आमचं प्रेम होतं. सगळ्या मुली अशाच फसव्या असतात असं ठाम मत झालं होतं. मला लग्नच करायचं नव्हतं. आई, राधाला यातलं काही माहिती नाहीए.’’

‘‘माधव, मला सगळं माहिती आहे. तुझा देवदास झाला होता. तुझ्या आणि माझ्या आईने मला माहिती पुरवून पार्श्वभूमी बरोबर तयार केली होती. मीराचा फोटो पाहून मी माझा मेकओव्हरसुद्धा करून घेतला. मला प्रथम पाहिलंस तेव्हा मीराचा भास झाला ना?’’

‘‘अंद…अं…हो…ही.’’

‘‘म्हणून तर तुझं माझ्याकडे लक्ष गेलं.’’

‘‘नजर पडली मीरावर पण प्रेमांत पडलास राधाच्या. खरं की नाही?’’

‘‘हो खरंय. पण ऑफिसच्या माझ्या जाण्यायेण्याच्या वेळा?’’

‘‘माझ्या दोन मैत्रिणी आहेत तुझ्या ऑफिसात. अगदी तुझ्याच सेक्सशनमध्ये. त्यांनी स्पाय मिशन केलं. वॉटस् अॅप, मेसेजवरून तुझी सर्व माहिती कळत होती. त्याप्रमाणे मी हालचाली करत होते.’’

‘‘मग रिक्षा शोधायला जाताना…’’

‘‘तू बाहेर पडलास की मला मेसेज यायचा. मग माझी ऑफिसातून एकझिट.

तुझी गाडी शेजारून जायची, पण तुझं माझ्याकडे लक्षच नसायचं.’’

‘‘अशा कितीतरी मुली रस्त्यावरून जातात. उगीचच कोणाला न्याहाळायचं म्हणजे? पण तू तरी कुठे ओळख दाखवलीस?’’

‘‘तू पुढाकार घ्यावासा असं वाटायचं. मी तुला आवडले की नाही काय माहीत.’’

‘‘मलाही असंच वाटत होतं.’’

माधवच्या आईने आणखी एक माहिती दिली.

‘‘बरं का माधवा, सुशिलेला जावई म्हणून तूच हवा होतास. अनायसे दोघांच्या पत्रिकाही उत्तम जमत होत्या. पण हा तिढा होता ना? तुम्ही मुलांनीच सोडवलेत हो ना.’’

‘‘मावशी, खरे धन्यवाद त्या चोरांचे मानायला हवेत..त्यांनी माझी पर्स पळवली म्हणून या महाशयांचं लक्ष गेलं. त्या निमित्ताने का होईना, मैत्रीची रूजूवात झाला.’’

‘‘चोरांचे आभार सहज मानता येतील.’’

राधाच्या वडिलांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘‘काय म्हणताय माधवराव! आभार मानायला ते चोर सापडेले पाहिजे ना!’’

‘‘सापडतील नक्की. तुम्हांला वाटलं एवढी मोठी गँग तयार करून, फ्लॅन रचून तुम्ही माझा पोपट केलाय. पण बच्चमजी, हम भी कुछ कम नहीं.’’

‘‘अगंबाई म्हणजे काय?’’ राधाच्या आईचे आश्चर्य.

‘‘माधवराव, छुपे रूस्तम निघालात हां तुम्ही.’’

‘‘छान झालं. त्यामुळेच मला माझ्या मनाजोगती सून मिळाली.’’

‘‘चला. शेवट गोड ते सगळच गोड. माधवच्या आई गोडाचा शिरा होऊन जाऊ दे.’’

‘‘चल गं सुशिले माझ्या मदतीला.’’

‘‘सुधाकरराव. शिरा होईपर्यंत आपण चक्कर मारून येऊ या का?’’

आता खोलीत राधा आणि माधवच राहिले.‘‘’’

‘‘शिरा खायच्या आधी तोंड गोड करावं म्हणतो.’’

राधा लाजून अधोवदन झीली. तिला माधवने कवटाळले.

‘‘हाय हाय मर जांवा. या खळीनेच मी घायाळ झालो. राधा ही बावरी.’’

‘‘माधवची’’ दोघांच्या हास्याचा मिलाप झाला.

दोन्ही हातात लाडू

कथा * सुनीता भटनागर

ऑफिसमधले सर्व सहकारी रंजनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मागे लागले होते. खरं तर त्यांनी तिच्यावर दबावच आणला होता. तिने मोहितला फोन केला, ‘‘ही सगळी मंडळी उद्याच्या वेडिंग अॅनव्हरसरीची पार्टी मागताहेत. मी त्यांना काय सांगू?’’

‘‘आईबाबांना विचारल्याशिवाय कुणालाही घरी बोलावणं बरोबर नाही.’’ मोहितच्या आवाजात काळजी होती.

‘‘पण मग यांच्या पार्टीचं काय?’’

‘‘रात्री विचार करुन ठरवूयात.’’

‘‘ओ. के.’’

रंजनाने फोन बंद केला. त्याचं म्हणणं तिने सर्वांना सांगितलं तसे सगळे तिला ताणायला लागले. ‘‘आम्ही व्यवस्थित गिफ्ट घेऊन येऊ. फुकट पार्टी खाणार नाही.’’

‘‘अगं, सासूला इतकी घाबरून राहाशील तर सगळं आयुष्य रडतंच काढावं लागेल.’’

थोडा वेळ सर्वांचं ऐकून घेतल्यावर रंजनाने एकदम मोठ्या आवाजात म्हटलं, ‘‘हे बघा, माझं डोकं खाणं बंद करा. मी काय सांगतेय ते नीट लक्षपूर्वक ऐका. उद्या, म्हणजे रविवारी, रात्री आठ वाजता तुम्ही सर्व जेवायला ‘सागररत्न’ रेस्टॉरण्टमध्ये येता आहात. गिफ्ट आणणं कम्पल्सरी आहे अन् गिफ्ट चांगली आणा. आणायचं म्हणून आणू नका. गिफ्ट घरी विसरून येऊ नका.’’

तिच्या या घोषणेचं सर्वांनीच टाळ्या वाजवून स्वागत केलं.

ऑफिस सोडण्यापूर्वी संगीता मॅडमने तिला एकटीला गाठून विचारलं, ‘‘रंजना, तू हे पार्टीचं आमंत्रण देऊन स्वत:वर संकट तर नाही ना ओढवून घेतलंस?’’

‘‘आता जे होईल ते बघूयात, मॅडम,’’ रंजनाने हसून म्हटलं.

‘‘बघ बाई, घरात फारच टेन्शन असलं तर मला फोन कर. मी सगळ्यांना पार्टी कॅन्सल झाल्याचं कळवेन. फक्त उद्याचा दिवस तू रडू नकोस, उदास अन् दु:खी होऊ नकोस..प्लीज…’’

‘‘नाही मॅडम, जे काही रडायचं होतं ते मी गेल्यावर्षी पहिल्या मॅरेज अॅनव्हरसरीलाच आटोपून घेतलंय. तुम्हाला माहीतंच आहे सगळं.’’

‘‘हो गं! तेच सगळं आठवतंय मला.’’

‘‘माझी काळजी करू नका मॅडम; कारण एका वर्षात मी खूप बदलले आहे.’’

‘‘हे मात्र खरंय. तू खूप बदलली आहेस. सासूचा संताप, सासऱ्याचं रागावणं, नणंदेचं टोचून, जिव्हारी लागेल असं बोलणं याचा अजिबात विचार तुझ्या मनात नाहीए. तू बिनधास्त आहेस. हे खरंच कौतुकास्पद आहे.’’

‘‘हो ना मॅडम, आता मी टेन्शन घेत नाही. उगाचच भिऊनही राहात नाही. उद्या रात्री पार्टी नक्की होणार. तुम्ही सरांना अन् मुलांना घेऊन वेळेवर पोहोचा.’’ रंजनाने हसून त्यांचा निरोप घेत म्हटलं.

रंजनाने त्यांची परवानगी न घेता ऑफिस स्टाफला पार्टी द्यायची ठरवलंय हे ऐकून तिची सासू एकदम भडकली. ज्वालामुखीचा स्फोट म्हणायला हरकत नाही.

‘‘आम्हाला न विचारता असे निर्णय घ्यायचा हक्क तुला कुणी दिला, सूनबाई? इथल्या शिस्तीप्रमाणे, नियमांप्रमाणे वागायचं नसेल तर सरळ वेगळं घर करून राहा.’’

‘‘आई, ते सगळे माझ्या इतके मागे लागले होते की काय सांगू? पण तुम्हाला जर ते आवडलं नसेल तर मी सगळ्यांनाच फोन करून पार्टी कॅन्सल केल्याचं कळवून टाकते,’’ अगदी शांतपणे बोलून रंजनाने तिथूच काढता पाय घेतला. ती सरळ स्वयंपाकघात जाऊन कामाला लागली.

सासू अजूनही संतापून बडबडत होती. तेवढ्यात रंजनाची नणंद म्हणाली, ‘‘आई, वहिनीला जर स्वत:च्याच मर्जीने वागायचं आहे तर तू उगीचच आरडाओरडा करून स्वत:चं अन् आमचंही डोकं का फिरवते आहेस? तू इथे तिच्या नावाने शंख करते आहेस अन् ती मजेत आत गाणं गुणगुणते आहे. स्वत:चाच पाणउतारा करून काय मिळतंय तुला?’’

संतापात आणखी तेल ओतणारं आपल्या लेकीचं वक्तव्य ऐकून सासू अधिकच बिथरली. खूप वेळ तिची बडबड सुरूच होती.

रंजना मात्र शांतपणे कामं आवरत होती. सर्व स्वयंपाक तिने व्यवस्थित टेबलवर मांडला अन् मोठ्यांदा म्हणाली, ‘‘जेवायला चला, जेवण तयार आहे.’’

सगळी मंडळी डायनिंग टेबलाशी येऊन बसली. नणंद, सासू अन् नवऱ्याच्या चेहऱ्यावर राग अजून दिसत होता. सासरे मात्र हल्ली निवळले होते. सुनेशी चांगलं वागायचे. पण सासू त्यांना सतत धाकात ठेवायची. आत्ताही ते काही तरी हलकंफुलकं संभाषण काढून वातावरण निवळावं असा प्रयत्न करत होते पण सासूने एक जळजळीत दृष्टिक्षेप त्यांच्याकडे टाकून त्यांना गप्प बसवलं.

रंजना अगदी शांत होती. प्रेमाने सर्वांना वाढत होती. नणंदेच्या कडवट खोचक बोलण्यावर ती हसून गोड भाषेत उत्तर देत होती. सासूला रंजनाच्या गप्प बसण्यामुळे भांडण वाढवता आलं नाही.

आपल्या खोलीत ती पोहोचली तेव्हा मोहितनेही आपला राग व्यक्त केलाच. ‘‘इतर कुणाची नाही तर निदान माझी परवानगी तरी तू निर्णय घेण्यापूर्वी घ्यायला हवी होतीस. मला तुझा निर्णय मान्य नाही. मी उद्या पार्टीला असणार नाही.’’

खट्याळपणे हसत, खांदे उडवून रंजनाने म्हटलं, ‘‘तुमची मर्जी.’’ अन् त्याला काही कळायच्या आत त्याच्या गालावर एक चुंबन देऊन ती वॉशरूमकडे गेली.

रात्री बारा वाजता रंजनाच्या मोबाइलचा अलार्म वाजल्यामुळे दोघांचीही झोप मोडली. ‘‘हा अलार्म का वाजतोए?’’ मोहितने तिरसटून विचारलं.

‘‘हॅप्पी मॅरेज अॅनव्हसरी स्वीट हार्ट.’’ त्याच्या कानाशी ओठ नेऊन अत्यंत प्रेमासक्त स्वरात रंजनाने म्हटलं.

रंजनाचा लाडिक स्वर, तिच्या देहाला येणारा सेंटचा मादक सुगंध अन् डोळ्यातलं आमंत्रण बघून मोहित तर राग विसरला, सुखावला अन् त्याने रंजनाला मिठीत घेतलं.

त्या रात्री रतिक्रीडेत आपलं सर्व कौशल्य पणाला लावून रंजनाने मोहितला तृप्त केलं. नकळत तो बोलून गेला. ‘‘इतकी चांगली गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.’’

तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत, रंजनाने विचारलं, ‘‘उद्या माझ्याबरोबर चलाल ना?’’

‘‘पार्टीला?’’ मघाचं सर्व प्रेमबीम विसरून मोहितने कपाळावर आठ्या घालत विचारलं.

‘‘इश्श! मी सकाळी पार्कात फिरायला जाण्याबद्दल विचारत होते.’’

‘‘असं होय? जाऊयात की!’’

‘‘खरंच? किती छान आहात हो तुम्ही.’’ त्याला मिठी मारत रंजनाने शांतपणे डोळे मिटून घेतले.

सकाळी सहालाच उठून रंजनाने आपलं आवरलं. छानपैकी तयार झाली. जागा झालेल्या मोहितने तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘यू आर ब्यूटीफूल.’’ रंजनाला हे कौतुक सुखावून गेलं.

मोहित तिला जवळ घेणार तेवढ्यात त्याला चुकवून हसत हसत ती खोलीबाहेर पडली.

स्वयंपाकघरात जाऊन तिने सर्वांसाठी चहा केला. सासूसासऱ्यांच्या खोलीत चहाचा ट्रे नेऊन ठेवला अन् त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

चहाचा कप हातात घेत सासूशी रागाने तिच्याकडे बघत विचारलं, ‘‘सकाळी सकाळीच माहेरी जाते आहेस का?’’

‘‘आम्ही पार्कात फिरायला जातोए, आई,’’ अगदी नम्रपणे रंजनाने म्हटलं.

सासूबाईंनी काही म्हणण्याआधीच सासरे चहा पिता पिता म्हणाले, ‘‘जा, जा, सकाळी फिरणं आरोग्याला हितकारक असतं. तुम्ही अवश्य जा.’’

‘‘जाऊ ना, आई?’’

‘‘कुठलंही काम करण्यापूर्वी माझी परवानगी घेणं कधी सुरू केलंस, सूनबाई?’’

आपला राग व्यक्त करण्याची संधी सासूबाईंनी सोडली नाही.

‘‘आई, तुम्ही माझ्यावर अशा रागावत जाऊ नका ना? आम्ही लवकरच येतो,’’ म्हणत लाडक्या लेकीने आईच्या गळ्यात पडावं तशी ती सासूच्या गळ्यात पडली अन् त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांच्या गालाचा हलकेच मुका घेऊन प्रसन्न वदनाने खोलीबाहेर पडली.

बावचळलेल्या सासूला बोलणं सुधरेना. सासरे मात्र खळखळून हसले.

मोहित आणि ती पार्कात पोहोचली तेव्हा तिथे त्यांच्या परिचयाचे अनेक लोक वॉकसाठी आले होते. वॉक घेऊन ती दोघं तिथल्या प्रसिद्ध हलवायाच्या दुकानात गेली. दोघांनी फेमस आलू कचोरी अन् जिलेबी खाल्ली. घरच्या लोकांसाठी बांधून बरोबर घेतली.

आठ वाजता ती घरी पोहोचली अन् बरोबर आणलेल्या वस्तू ब्रेकफास्ट टेबलवर मांडून सर्वांना खायला बोलावलं. इतका चविष्ट अन् रोजच्यापेक्षा वेगळा नाश्ता बघूनही सासू व नणंदेची कळी खुलली नाही.

दोघीही रंजनाशी बोलतंच नव्हत्या. सासरेबुवांना आता काळजी पडली. बायको अन् मुलगी दोघींचीही सुनेच्या बाबतीतली वागणूक त्यांना अजिबात आवडत नव्हती. पण ते बोलू शकत नव्हते. एक शब्द जरी ते सुनेची कड घेऊन बोलले असते तर मायलेकींनी त्यांना फाडून खाल्लं असतं.

ब्रेकफास्ट अन् दुसरा चहा आटोपून रंजना आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने ती खूप छान नटूनथटून आली अन् स्वयंपाकाला लागली. नणंदेने तिला इतकी सुंदर साडी स्वयंपाक करताना नको नेसू असं सुचवलं, त्यावर ती हसून म्हणाली, ‘‘त्याचं काय आहे वन्स, तुमच्या भावाने आज या साडीत मी फार छान दिसतेय असं म्हटलं आहे. त्यामुळे आता ही साडी अन् हा सगळा साजशृंगार मी रात्रीच उतरवणार आहे.’’

‘‘अगं, पण इतक्या महाग साडीवर डाग पडतील, ती भिजेल, चुरगळेल याची भीती किंवा काळजी नाही वाटत तुला?’’

‘‘भीती अन् काळजीला तर मी कधीच ‘बाय बाय’ केलंय, वन्स.’’

‘‘माझ्या मते एखादा मूर्खच आपल्या वस्तुच्या नुकसानीची काळजी करत असेल.’’ संतापून मेधा म्हणाली.

‘‘मला वाटतं, मी मूर्ख नाहीए, पण तुमच्या भावाच्या प्रेमात मात्र पार वेडी झाले आहे. कारण तो फार चांगला आहे, तुमच्यासारखाच!’’ हसत हसत रंजनाने लाडाने मेधाचा गालगुच्चा घेतला अन् तिची गळाभेट घेतली. अकस्मात घडलेल्या या प्रसंगाने मेधा बावचळली, गोंधळली अन् मग स्वत:ही हसायला लागली.

रंजनाने फक्त एक भाजी बाहेरून मागवली होती. बाकी सर्व स्वयंपाक तिने घरीच केला होता. ‘पनीर पसंदा’ ही भाजी मोहितला अन् मेधाला फार आवडते त्यासाठी तिने मुद्दाम ती बाहेरून मागवली होती.

जेवायला सर्व मंडळी टेबलापाशी आली तेव्हा आवडता मेन्यू बघून मेधाची कळी खुलली मात्र सासूबाईंनी राग बोलून दाखवलाच.

‘‘हल्लीच्या मुलींना ना, उठसूठ पैसे खर्च करायचा सोस आहे. पुढे येणारा काळ कसा असेल सांगता येत नाही, त्यासाठीच आधीपासून बचत करून पैसा शिल्लक टाकावा लागतो. जे लोक पैसा वाचवत नाहीत त्यांना पुढे पश्चात्ताप करावा लागतो.’’

रंजनाने वाढता वाढता हसून म्हटलं, ‘‘खरंच आई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.’’ त्यानंतर जेवणं मजेत झाली. सासूच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत त्यांच्या प्रत्येक गोष्टीला रंजना हसून प्रतिसाद देत होती.

त्या दिवशी गिफ्ट म्हणून मोहितला शर्ट अन् रंजनाला साडी मिळाली. त्यांनीही मेधाला तिचा आवडता सेंट, आईंना साडी अन् बाबांना स्वेटर दिला. गिफ्टच्या देवाण-घेवाणीमुळे घरातलं वातावरण जरा आनंदी अन् चैतन्यमय झालं.

सगळ्यांनाच ठाऊक होतं रात्री आठ वाजता ‘सागररत्न’मध्ये पार्टी आहे. पण सहाच्या सुमारास जेव्हा मोहित हॉलमध्ये आला तेव्हा एकूणच वातावरण भयंकर टेन्स असल्याचं त्याला जाणवलं.

‘‘तुम्हाला पार्टीला जायचं आहे तर आमच्या परवानगीविना जा,’’ त्याच्याकडे लक्ष जाताच आईने ठणकावून सांगितलं.

‘‘आज खरं म्हणजे आपण सगळे मिळून कुठे फिरायला किंवा सिनेमाला गेलो असतो तर चांगलं झालं असतं,’’ मेधाने फुणफुण केली.

‘‘रंजना पार्टीला जायचं नाही, म्हणतेय,’’ मोहितच्या या बोलण्यावर ती तिघंही दचकली.

‘‘सूनबाई पार्टीला का जाणार नाही म्हणतेय?’’ काळजीच्या सुरात बाबांनी विचारलं.

‘‘तिचं म्हणणं आहे, तुम्ही तिघं पार्टीला आला नाहीत, तर तीही पार्टीला जाणार नाही.’’

‘‘अरे व्वा? नाटक करायला छान येतंय सुनेला,’’ वाईट तोंड करत सासूबाई वदल्या.

मोहित डोळे मिटून सोफ्यावर गप्प बसून होता. त्या तिघांचेच वाद सुरू होते.

शेवटी बाबांनी अल्टिमेटम दिलं. ‘‘आपल्या सूनबाईचा असा अपमान करण्याचा काहीच हक्क नाहीए. तिच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा आपल्याबद्दल किती वाईट समज होईल याचा विचार करा. अन् शेवटचं सांगतोय, तुम्ही दोघी पटापट आवरा अन् आपण निघूयात. तुम्ही माझं ऐकलं नाही तर आजपासून मी या घरात जेवण घेणार नाही.’’ बाबांची धमकी मात्र लागू पडली.

सर्व कुटुंब अगदी बरोबर वेळेत ‘सागर रत्न’ला पोहोचलं. रंजनाच्या सहकाऱ्यांचं स्वागत सर्वांनी मिळून, प्रेमाने, आपलेपणाने केलं. संपूर्ण कुटुंब असं प्रसन्न मुद्रेत बघून सर्व पाहुणे मनोमन चकित अन् हर्षिंत झाले होते.

पार्टी छानच झाली. भरपूर गिफ्ट्स मिळाल्या. हास्यविनोदात वेळ इतका छान गेला. त्यासोबत चविष्ट जेवण. होस्ट अन् गेस्ट सगळेच खूष होते.

संगीता मॅडमने तेवढ्यात रंजनाला एकटीला एकीकडे गाठून विचारलं, ‘‘कसं काय राजी केलंस तू सर्वांना?’’

रंजनाचे डोळे चमकले. हसून ती म्हणाली, ‘‘आज मी तुम्हाला माझ्यातला बदल कसा झाला ते सांगते.’’

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी खूप रडले. दु:खी झाले. रात्री पलंगावर पडले तेव्हा माझ्या लक्षात आलं, मला रडताना बघून त्यावेळी कुणी हसत नव्हतं. पण मला उदास, दु:खी बघून माझ्या सासूच्या व नणंदेच्या डोळ्यांत आसूरी आनंद दिसत होता. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की घरातल्या खास आनंदाच्या प्रसंगी कुरापत काढून, समारंभाचा विचका करून, दुसऱ्याला दु:खी करूनच काही लोकांना आनंद मिळतो. हा साक्षात्कार झाला अन् मी ठरवलं यापुढे या लोकांना तशी संधीच द्यायची नाही. आपला आनंद आपण जपायचा. विनाकारण वाद घालायचा नाही. चेहरा पाडायचा नाही, गप्प बसायचं, प्रसन्न राहायचं.

लोकांना मी दोन कॅटेगरीत टाकलंय. काही लोक माझ्या आनंदाने सुखावतात, आनंदी होतात. काहींना माझा आनंद सहन होत नाही. मी या दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांना भाव देत नाही. त्यांना जे करायचं आहे ते करू देत, आपण शांतच राहायचं. प्रेमाने वागायचं.

आता वन्स काय, सासूबाई काय कुणीच मला चिडवू शकत नाहीत, रडवूही शकत नाहीत. मोहितलाही मी सतत तृप्त ठेवते. त्यामुळे आमच्यात भांडणं होत नाहीत अन् तोही माझं ऐकतो.

पूर्वी मी रडायची. आता हसत असते. आपला आनंद, आपल्या मनाची शांतता का म्हणून कुणाला हिरावून घेऊ द्यायची?

ज्यांना मला दु:खी करायचं असतं, ते मला प्रसन्न बघून स्वत:च चिडचिडतात, त्रासतात. मला काहीच करावं लागत नाही अन् त्यांना धडा मिळतो. माझ्या शुभचिंतकांना तर माझा आनंद हवाच असतो. मीही प्रसन्न तेही प्रसन्न!

आता माझ्या दोन्ही हातात लाडू आहेत. मी मजेत जगते आहे. एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली आहे की आपण आनंदी राहातो तेव्हा आपला राग करणारी माणसंही हळूहळू निवळतात. माझी सासू अन् नणंद त्यामुळेच इथे आल्या आहेत आणि त्यांच्या येण्याने मी अधिकच आनंदात आहे.

संगीता मॅडमनने प्रेमाने तिला आलिंगन देत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ‘‘तुझ्यासारखी सून सर्वांना मिळो गं पोरी…अगदी मलासुद्धा!’’ त्या कौतुकाने बोलल्या.

‘‘व्वा! मॅडम किती छान कॉम्प्लिमेंट दिलीत. थँक्यू व्हेरी मच.’’ त्यांच्याशी हस्तांदोलन करताना रंजनाच्या डोळ्यांत अश्रू आले पण ते आनंदाचे अन् समाधानाचे होते.

प्रिय दादा

कथा * कुसुम आठले

श्रावणाचा महिना. दुपारचे तीन वाजलेले. पाऊस पडत असल्यामुळे हवेत सुखद गारवा होता, पण बाजारात वर्दळ नव्हती. सायबर कॅफेत काम करणारे तीन तरूण चहाचे घुटके घेत गप्पा मारत होते. आतल्या एक दोन केबिनमध्ये मुलं व्हिडिओ गेम खेळण्यात मग्न होती. दोन किशोरवयीन मुलं दुपारच्या निवांतपणाचा फायदा घेत मनाजोगत्या साईट उघडून बसली होती.

तेवढ्यात एका स्त्रीनं तिथं प्रवेश केला. तरूण तिला बघून दचकले, कारण खूपच दिवसांनी दुपारच्या वेळात कुणी स्त्री त्यांच्या कॅफेत आली होती. त्यांनी घाईघाईनं चहा संपवून आपापल्या विभागाकडे धाव घेतली.

स्त्री चांगल्या घराण्यातली दिसत होती. राहणी अन् चालण्यातून सुसंस्कृतपणा जाणवत होता. शिक्षणामुळे येणारा आत्मविश्वास हालचालींमधून कळत होता. तिनं छत्री मिटून तिथल्याच एका बादलीत पाणी निथळण्यासाठी ठेवली. केस नीट केले, मग काउंटरवर बसलेल्या मुलाला म्हणाली, ‘‘मला एक पत्र टाइप करून घ्यायचं आहे…मी केलं असतं, पण मला मराठी टायपिंग येत नाही…’’

‘‘तुम्ही मजकूर सांगाल की…’’

‘‘होय, मी बोलते, तू टाइप कर. शुद्धलेखन चांगलं आहे ना? करू शकशील नं?’’

मुलगा किंचित बावरला, पण म्हणाला, ‘‘करतो की!’’

ती बोलायला लागली, ‘‘प्रिय दादा, माझ्याकडून ही शेवटची राखी तुला पाठवते आहे, कारण यापुढे तुला राखी पाठवणं मला जमणार नाही. तू गैरसमज करून घेऊ नकोस. माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीए, कारण तो हक्क तू फार पूर्वीच गमावला आहेस.’’

ती काही क्षण थांबली. तिचा चेहरा लाल झाला होता. ‘‘पाणी मिळेल का प्यायला?’’ तिनं विचारलं.

‘‘हो, देतो,’’ म्हणत त्या तरूणानं तिला पाण्याची बाटली दिली. बाई पुढे काय सांगते आहे याबद्दल त्याला उत्सुकता होती. त्याला यात काही तरी गुढ आहे असं वाटू लागलं होतं.

ती पाणी प्यायली, चेहऱ्यावरून रूमाल फिरवला अन् ती मजकूर सांगू लागली, ‘‘किती सुखी कुटुंब होतं आपलं. आपण पाच बहीणभाऊ, तू सर्वात मोठा अन् सुरूवातीपासून आईचा फारच लाडका. बाबांची साधीशी नोकरी होती, पण तुला शिकायला शहरात पाठवलं. बाबांची अजिबात इच्छा नव्हती. पण बाबांच्या इच्छेविरूद्ध जाऊन आईनं तुझी इच्छा पूर्ण केली. त्यासाठी तिनं दोन दिवस उपोषण केलं होतं हे तू ही विसरला नसशील. तुला मेडिकल कॉलेजात अॅडमिशन मिळाली, तेव्हा मी ओरडून ओरडून मैत्रिणींना बातमी दिली होती. त्यांना माझा हेवा वाटला होता. एकीनं तर मुद्दाम म्हटलं होतं, ‘‘तुलाच मेडिकलला प्रवेश मिळाल्यासारखी नाचते आहेस.’’ मी ही आढ्यतेनं म्हटलं होतं, ‘‘दादा असो की मी, काय फरक पडतोय? आम्ही एकाच आईची मुलं आहोत. आमच्या शरीरात रक्त तेच वाहतंय…’’ दादा मी चुकीचं बोलले होते का?

‘‘तू होस्टेलला राहत होतास, जेव्हा घरी यायचास, मी अन् आई सोनेरी स्वप्नांत दंग होत असू. आई स्वप्नं बघायची, तुझं छानसं क्लिनिक आहे. प्रसन्न चेहऱ्यानं, प्रेमळ हसू चेहऱ्यावर घेऊन तू पेशंट तपासतो आहेस, पेशंटची रांग संपता संपत नाहीए. जाताना प्रत्येक पेशंट आदरानं नमस्कार करतो. पैसे देतो व तुझा ड्रॉवर पैशानं ओसंडून वाहतो…ते सगळे पैसे आणून तू आईच्या पदरात ओततोस…आईचा चेहरा आनंदानं, कृतार्थतेनं डवरून येतो…तू आईशी असंच बोलायचा म्हणून ती स्वप्नं बघायची.

‘‘मी स्वप्नं बघायची की मी नववधूच्या वेषात उभी आहे. देखणा, संपन्न घरातला, भरपूर पगाराची नोकरी असणारा माझा नवरा शेजारी उभा आहे. माझ्या पाठवणीसाठी आणलेल्या कारला तू फुलांनी सजवतो आहेस. मला कारमध्ये बसवताना आपण एकमेकांना मिठी मारून रडतो आहेत…

‘‘बाबा व्यवहारी होते. ते आम्हाला अशा स्वप्नातून जागं करायला बघायचे पण आम्हा मायलेकींची झोपेतून जागं व्हायची इच्छाच नसायची. तुझ्या गोड गोड बोलण्यानं तू आम्हाला झुलवत, भुलवत होतास.

‘‘इतर दोघी बहिणी अन् एक भाऊ अजून शिकत होते. पण आईला तुझ्या लग्नाची स्वप्नं पडू लागली होती. सुंदर, शालीन, नम्र सून तिला घरात वावरताना दिसायची. सासू म्हणून मिरवताना तिचा चेहरा अभिमानांनं फुलून यायचा. सुनेच्या माहेराहून मिळालेल्या भेटवस्तूंनी आमचं कायम अभावानं ग्रस्त घर भरून गेलेलं दिसायचं.

‘‘तू होस्टेलहून घरी यायचास, आई किती किती पदार्थ बनवून तुला खायला घालायची. बरोबर डबेही भरून द्यायची. हे सगळं करताना तिला कुठून, कशी शक्ती मिळायची मला कळत नसे. एरवी ती सदैव डोकेदुखीनं वैतागलेली असायची.

‘‘आमची स्वप्नं पूर्ण होऊ घातली होती. तुला डिग्री मिळाली होती. होस्टेलचं सामान आवरून तू घरी यायला निघाला असतानाच तुला लग्नाचा एक प्रस्ताव आला. तुझी वर्गमैत्रीण…तिच्या वडिलांनी तुला बरोबर हेरला होता. तू आईला ही बातमी सांगितलीस अन् आईला खूप आनंद झाला. डॉक्टर सून घरी येणार म्हणजे घरात दुप्पट पैसा येणार हा तिचा भाबडा समज. आई स्वत:च्या भाग्यावर बेहद्द खुष होती. सगळ्या आळीत घरोघरी जाऊन सांगून आली, ‘‘येणारी सूनही डॉक्टर आहे.’’ मी मात्र उगीचच शंकित होते.

‘‘तुझं लग्नं झालं अन् घरात उरले मी…माझ्या लग्नाची काळजी आईला होती.

आईनं तुला विश्वासात घेऊन सांगितलं, ‘‘हे बघ, छोटीसाठी मी थोडे फार दागिने केले आहेत…काही पैसेही साठवून ठेवले आहेत. तू छोटीसाठी छानसा नवरा शोध…तू इथंच राहतो आहेस म्हटल्यावर बाकीची सोय तू बघशीलच!! भाऊ भावजय डॉक्टर आहेत म्हटल्यावर चांगलं स्थळ मिळेलच.’’

‘‘सगळं बरं चाललंय म्हणतोय तोवर एक दिवस वहिनीनं घरात फर्मान काढलं.

‘‘या गावात क्लिनिक काढून फायदा नाही. क्लिनिकसाठी अद्ययावत यंत्रं लागतात. ती घ्यायला तुमच्याकडे पैसा नाही. त्यापेक्षा नोकरी चांगली. माझ्या वडिलांनी आमच्या दोघांसाठी चांगली नोकरी बघितली आहे…आम्ही तिकडेच जातो.’’

‘‘अन् तुम्ही दोघं निघून गेलात. त्यानंतर जेव्हा जेव्हा तू यायचास तेव्हा तुझ्याबरोबर वहिनीनं केलेल्या मागण्यांची अन् आपल्या घराबद्दलच्या असंख्य तक्रारींची यादी असायची. बाबांकडे तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं बळ नव्हतं. इतर तीन भावंडांची काळजी होती. त्यांची शिक्षणं, त्यांची लग्नं…वहिनीचा तोरा, तुझा मिंधेपणा, आईची झालेली निराशा हे सगळं बघून त्यांनी आपापली शिक्षणं पटापट आटोपती घेतली. दोघी ताईंनी सामान्य परिस्थितीतल्या बऱ्यापैकी मुलांशी लग्न करून गरीबीचेच संसार थाटले. रमेश भाऊनं एक छोटीशी नोकरी शोधून घरखर्चाला हातभार लावायचा प्रयत्न केला…दादा, त्या काळात तुझ्या चेहऱ्यावर असहायता अन् काळजीचा संगम मी बघत होते. तुझा हसरा आनंदी स्वभाव पार बदलला होता. तू कायम चिडचिडा अन् तणांवात असायचास.

वहिनीच्या मते तिची सासू गावंढळ, बावळट होती, सासरे हुकुमशहा होते अन् धाकटी नणंद म्हणजे मी त्यांच्यावरचं एक ओझं होते. तुला वाटायचं आईनं वहिनीला समजून घ्यावं. आईत तेवढं बळंच नव्हतं. ती पार कोलमडली होती. समजून घेण्याची जबाबदारी खरं तर वहिनीची होती, पण तिच्यात तो गुणच नव्हता. तू ही आम्हाला वहिनीच्या दृष्टीनंच बघायला लागला होतास…काही अंशी तुझा नाइलाज होता, काही अंशी स्वार्थ…एक दिवस तू ही सांगून टाकलंस की मला एकच काहीतरी निवडायला लागेल.

‘‘आईनं इथंही तिचं प्रेम उधळून दिलं. तू तुझ्या संसारात सुखी रहावंस म्हणून तुला आमच्यापासून कायमचं मुक्त केलं.

‘‘त्यानंतर क्वचितच तू घरी यायचास, एखाद्या परक्या माणसासारखा पण हक्कानं पाहुणचार वसूल करून निघून जायचास. बाबांनी माझ्याकरता स्थळ शोधलं, लग्नही करून दिलं. पण मनांतून मला वाटायचं, तू असतास तर नक्कीच माझ्यासाठी याहून चांगलं स्थळ शोधलं असतंस. मी तुझी किती वाट बघत होते. पण तू अगदी शेवटच्या क्षणी आलास. बाबांनी अन् गरीबीत संसार करणाऱ्या माझ्या बहीण भावानं जमलं तसं माझं लग्न करून दिलं.

‘‘मी सासरी गेल्यावर आई अजूनच एकटी झाली. मी कधी माहेरी गेले तर तिच्या भकास डोळ्यात फक्त तूच दिसायचा. ती म्हणायची, ‘‘दादाला फोन कर गं! कसा आहे, ते विचार, घरी का येत नाही ते विचार, एकदा तरी घरी येऊन जा. घरी येणं बंदच केलंय…’’ ती रडायला लागे. बाबा पुरूष होते. त्यांना रडता येत नव्हतं. पण दु:ख त्यांच्याही चेहऱ्यावर दिसायचं. आईकडे सगळं असूनही काहीच नव्हतं, कारण तिचा लाडका मुलगा रागावून निघून गेला होता. ती मलाच विचारायची, ‘‘माझं काय चुकलं गं? दादाला शिकायला बाहेर पाठवलं हे चुकलं की डॉक्टर सून केली, हे चुकलं?’’ खरं तर तिचं काहीच चुकलं नव्हतं.

‘‘वडिलांनी दादाची आशा सोडली होती. पण आईची माया चिवट होती. बाबांना चोरून, लपवून ती दादाला पत्र लिहित असे. शेजारपाजारच्या मुलांकरवी ते पोस्टात पडेल असं बघायची. पाच सात पत्रानंतर वहिनीचं खडसावल्यासारखं पत्र यायचं, ‘‘बंद करा हे सगळं. आम्हाला सुखानं जगू द्या. किती छळणार आहात?’’

‘‘आई शेवटच्या घटका मोजत होती. पण दादा, तू आला नाहीस. तुला भेटायची आस मनी बाळगून, तुझं नाव घेत आईनं प्राण सोडला. तुला कळवल्यावर तू आलास पण तिचं क्रियाकर्म झाल्यावर…कदाचित आईचं क्रियाकर्म करण्याचा हक्क आपण गमावला आहे, हे तुला समजलं होतं.

‘‘आई तुझं नाव जपत मरून गेली. तुझी वाट बघत होती. पण मरतानाही तुझा वाटा माझ्याजवळ देऊन गेली. कारण ती आई होती. मी ही ते नाकारलं नाही, ठेवून घेतलं तुझ्यासाठी, कारण मी बहीण होते. पण दादा, तू मुलगा म्हणून कमी पडलास.

‘‘दादा, स्वार्थ माणसाला इतकं आंधळं करतो की सगळी नातीच विसरून जावीत? तू असा कधीच नव्हतास. सगळा दोष वहिनीला देऊ नकोस, प्रत्येक गोष्ट तिच्या इच्छेनं करताना एखादी तर गोष्ट स्वत:च्या इच्छेनं करण्याचं धाडस तू का दाखवू शकला नाहीस? तुला जर नात्याची किंमतच नाहीए तर माझी राखी न मिळाल्यामुळे तू विचलित का होतोस? मला कुणी तरी तुझा निरोप पोहोचवतो की यंदा तुला राखी मिळाली नाही…

‘‘दादा, राखी पाठवणं अन् ती मिळणं, एवढ्यातच राखीचा सण समावला आहे का? त्यासाठी जबाबदारीसुद्धा घ्यावी लागते. आज पंचवीस वर्षांत तुझी माझी गाठभेट नाही, तू माझ्याकडे आला नाहीस, मला कधी बोलावलं नाहीस, एवढ्या वर्षांत फक्त माझ्याकडून पाठवली जाणारी राखीच एखाद्या नाजूक तंतूसारखी जीव तगवून होती. पण आता तो धागाही तुटणार आहे. कारण राखी पाठवण्याची माझी इच्छाशक्ती आणि राखीवरचा माझा विश्वासही मोडीत निघाला आहे.

‘‘दादा, मला एकच सांग, घरात आम्ही तिघी बहिणी नसतो तर तू आईबाबांना टाकून गेला असतास? बहिणींची जबाबदारी हेच तुझ्या निघून जाण्याचं कारण होतं ना? अरे, पण आमच्या तुझ्याकडून खरोखरंच काही अपेक्षा नव्हत्या रे! तू एकदाच, फक्त एकदाच आमच्याशी बोलून तुझा प्रॉब्लेम, तुझी चिंता, तुझं दु:ख सांगायचं होतंस…काही तरी उपाय शोधता आला असता. ठीक आहे. आता जर तुला जमलंच तर माझी ही राखी माझी शेवटची आठवण म्हणून तुझ्याकडे जपून ठेव. तुझ्या हृदयात नसली तरी तुझ्या भल्या मोठ्या बंगल्यात तिच्यापुरेशी जागा नक्कीच असेल.’’

मजकूर सांगता सांगता ती स्त्री दु:खी आणि भावनाविवश होऊन थरथरंत होती, पण तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र आले नाहीत. कदाचित तिचे अश्रू आटले असतील, मजकूर लिहून घेणाऱ्याचे डोळे मात्र पाणावले होते.

काम पूर्ण झालं होतं. त्या स्त्रीनं तरूणाला म्हटलं, ‘‘याची एक कॉपी काढून मला दे, ती मी माझ्या दादाला पाठवेन, तुला सांगते, पंचवीस वर्षांनंतर प्रथमच मी हे सर्व लिहिण्याचं धाडस केलंय. इतकी वर्ष मी फक्त सर्वात धाकटी बहीण म्हणूनच जगले.

‘‘एक काम तू आणखी कर. हे माझं पत्र, माझा संदेश, इंटरनेटवरून अशा ब्लॉगवर जाऊ देत ज्यामुळे जास्तीत जास्त लोक तो वाचतील. जगात माझ्या दादासारखे अजूनही काही भाऊ असतील, ज्यांच्याकडून अशी चूक घडली असेल, निदान त्यांना ती चूक सुधारण्याची संधी मिळेल. हा संदेश माझ्या आईला अंतिम श्रद्धांजली म्हणून देते आहे. ती बिचारी मुलाच्या भेटीची आस अन् तो न येण्याचं दु:ख उराशी कवटाळून मरून गेली. तिच्या आत्म्याला निदान यामुळे शांती लाभेल.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें