दीपस्तंभ

कथा * डॉ. विनिता राहुरीकर

सविता एक पुस्तक घेऊन दिवाणखान्याच्या बाहेर आल्या आणि सोफ्यावर बसल्या. पुस्तके वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. रमाने येऊन टेबलावर चहा ठेवला. रमाला न बोलताही सविता यांना काय हवे, हे सर्व समजत असे. कामावर ठेवले तेव्हा तिला फक्त दोन दिवसच काम समजावून सांगावे लागले होते. तिसऱ्या दिवसापासून ती न सांगताही सर्व व्यवस्थित करू लागली.

‘‘आज बेबीसाठी काय बनवायचे?’’ रमाने विचारले.

‘‘आता ती फक्त जेवेल. संध्याकाळी आल्यावर तिलाच विचार,’’ सविताने उत्तर दिले.

रमा तिचा कप घेऊन तिथेच बसली, मग चहा संपवला आणि स्वयंपाकघरात काम करायला निघून गेली.

सविताचा मुलगा आणि सून दोघेही शहरातील नामांकित डॉक्टर होते. मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन तर सून स्त्रीरोग सर्जन होती. त्यांचे शहरात स्वत:चे मोठे रुग्णालय असल्यामुळे दोघांकडे जराही वेळ नव्हता. कधी मुलगा, कधी सून तर कधी दोघेही घरी येऊ शकत नव्हते. रुग्णालयात इतके रुग्ण होते की, घरी आल्यावरही त्यांना जेवायला वेळ मिळत नसे. म्हणूनच रूपल पाच वर्षांची झाल्यावर आणि दुसरे अपत्य होण्याची शक्यता नसताना सविता यांनीही त्यांच्याकडे हट्ट केला नाही. जेव्हा आई-वडिलांकडे वेळ नसतो, तेव्हा मुलं एक असो किंवा चार असोत, काय फरक पडतो? सविता यांच्या पतीचे निधन मुलाच्या लग्नापूर्वीच झाले होते. मुलगा आणि सून दोघेही आपल्या कामात व्यस्त होते.

रूपलच्या जन्मानंतरच त्यांचा एकटेपणा खऱ्या अर्थाने दूर झाला. वयाच्या तीन महिन्यांपासून त्या रूपलला सांभाळत होत्या. त्यामुळे सूनही निश्चिंत होती. घरातील प्रत्येक कामासाठी बाई होती. त्यांचे काम फक्त रूपलला सांभाळणे आणि तिचे संगोपन करणे, एवढेच होते. आपल्या एकाकी जीवनात रूपलच्या रूपात त्यांना जे छोटेसे खेळणे मिळाले होते, ते पूर्ण वेळ त्यांचे मन रमवत होते. तेव्हाच तर रूपलने पहिला शब्द आई नव्हे तर आजी असा उच्चारला होता. कितीतरी काळ ती आई-वडिलांना अनोळखी समजून त्यांच्याकडे जाताच रडायची.

पाच-सहा वर्षांची झाल्यावर तिला समजू लागले की, ते तिचे आई-वडील आहेत. रूपल तिच्या आजीच्या म्हणजेच सविता यांच्या खूप जवळ होती.

लहानपणापासून आजपर्यंत अभ्यासातली अडचण असो किंवा वैयक्तिक काही गरज असो, ती फक्त आजीकडेच धाव घ्यायची. तब्येत बिघडली असेल तरी आजी आणि मैत्रिणीशी भांडण झाले असले तरी ते सोडवण्यासाठीही तिला आजीच लागायची. म्हणूनच तर रूपल त्यांना दीपस्तंभ म्हणायची.

‘‘तू माझी दीपस्तंभ आहेस, आजी.’’

‘‘दीपस्तंभ? तो कसा काय?’’ सविता यांनी हसत विचारले.

‘‘जसे समुद्रकिनारी किंवा बेटांवर अंधारात जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी दीपस्तंभ असतात, जे त्यांना मार्गदर्शन करतात आणि अपघात होण्यापासून वाचवतात, त्याचप्रमाणे तू माझा दीपस्तंभ, माझा मार्गदर्शक, माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, जो प्रत्येकवेळी मला अंधारात मार्गदर्शन करतो,’’ असे म्हणत रूपल त्यांच्या गळयात हात घालून हलत असे.

तीच रुपल हळूहळू मोठी झाली. एमबीबीएस करून इंटर्नशिपही करू लागली. वेळ जणू पंख लावून उडून गेली, पण आजी आणि नातीमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. ते जसेच्या तसे राहिले.

रुपलने डॉक्टर व्हावे असे सविता यांना वाटत नव्हते. मुलगा आणि सुनेच्या व्यस्त दिनक्रमामुळे घरची झालेली अवस्था त्यांनी पाहिली होती. आजही घर फक्त सविता यांच्या खांद्यावर उभे होते. घर कसे चालवायचे, हे सुनेला कधी समजलेच नाही. ती बिचारी कधीच मातृत्व, आपल्या मुलीचे बालपण अनुभवू शकली नाही. तिच्या हाताने हजारो मुले जन्माला घातली, ती सुखरूप या जगात आली, पण ती स्वत: तिच्या एकुलत्या एका मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करू शकली नाही. हजारो मातांची कुस आनंदाने भरणाऱ्या तिच्या आयुष्यातला एकमेव आनंदही तिला अनुभवता आला नाही. सविता यांच्या मुलाची अवस्थाही त्यांच्या सुनेसारखीच झाली होती. ज्याने हजारो दुखत असलेल्या नसा सांभाळल्या, हजारो तुटलेल्या हाडांना जोडले तोच वेळेअभावी आपल्याच मुलीशी प्रेमाची तार जोडू शकला नाही.

सविता यांनी रूपलला आई-वडील दोघांचेही खूप प्रेम दिले. तिच्या मनात त्यांच्या विषयी कधीच तक्रारीला जागा निर्माण होऊ दिली नाही. म्हणूनच ती त्यांच्या व्यवसायाचा आणि त्या दोघांचाही खूप आदर करायची आणि तिने स्वत: डॉक्टर व्हायचे ठरवले. सविता यांना मात्र भीती होती की, रूपलला असे कुटुंब मिळाले की जिथे मुलांची काळजी घेणारे कोणीच नसले तर…

पुढे रुपलही डॉक्टर झाली.

‘‘आजी…’’ अशी लांबलचक हाक ऐकून सविता विचारातून बाहेर आल्या, रमाने दार उघडताच रूपल धावत आजीकडे गेली आणि सविता यांच्या गळयात हात घालून झुलू लागली.

‘‘एवढी मोठी झालीस, पण अजून तुझा बालिशपणा कमी झालेला नाही,’’ सविता तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

‘‘आणि हा बालिशपणा कधीच कमी होणार नाही,’’ रूपल आजीच्या गालाचे चुंबन घेत म्हणाली.

‘‘वेडे, तू कधी मोठी होशील की नाही,’’ सविता यांनी तिच्या गालावर हलकेच थोपटले.

‘‘मी मोठी कशी होऊ शकते? मी कालही तुझ्यापेक्षा लहान होती, आजही लहान आहे आणि नेहमी लहानच राहाणार,’’ रूपल तिच्या गालावर आपला गाल घासत म्हणाली.

सविता हसल्या, ‘‘चल, हात-तोंड धुवून घे, मी तुला जेवायला वाढायला सांगते.’’

‘‘ठीक आहे आजी, श्रेयही काही वेळात येणार आहे,’’ रूपल म्हणाली.

‘‘तो तुझ्यासोबत का नाही आला?’’ सविता यांनी विचारले.

‘‘त्याचा एक रुग्ण तपासणे बाकी होते, म्हणून तो म्हणाला की नंतर येतो. तो थोडयाच वेळात येईल,’’ असे म्हणत रूपल खोलीत गेली.

सविता यांनी रमाला जेवण बनवायला सांगितले. जेवण टेबलावर येईपर्यंत रूपलही हात-तोंड धुवून आली. तितक्यात श्रेयही आला. तो येताच सविता यांच्या पाया पडला. तिघेही जेवायला बसले. रुग्णालय जवळच होते, त्यामुळे रूपल दुपारी जेवायला घरी यायची. श्रेयचे घर दूर होते, त्यामुळे तो अनेकदा रूपलकडे जेवायला यायचा.

रूपल आणि श्रेयने एकत्रच एमबीबीएस केले होते आणि आता ते एकत्र इंटर्नशिप करत होते. एकत्र शिकताना ते एकमेकांना आवडू लागले.

श्रेय स्वत: चांगला, सभ्य, सुसंस्कृत मुलगा होता. त्याचे कुटुंबही चांगले होते. त्याला नकार देण्याचे कुठलेच कारण नव्हते. सविता यांना मात्र थोडीशी भीती वाटत होती की, रूपल तिच्या आई-वडिलांचाच कित्ता गिरवणार नाही ना? मग त्यांनी विचार केला की, आतार्पंयत त्यांचे हात-पाय नीट चालत आहेत, रूपलच्या मुलालाही त्या आरामात सांभाळू शकतील. थेट रूपलच्या मुलाचा विचार केल्यामुळे सविता यांना स्वत:वरच हसू आले.

काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. रूपल आणि श्रेयची इंटर्नशिप संपली. श्रेयने ऑन्कोलॉजीमध्ये तर रूपलने गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये एमडी केले. अजूनही रूपलचा सविता यांच्यासोबत दुपारचे जेवण जेवण्याचा दिनक्रम सुरू होता. बऱ्याचदा श्रेयही त्यांच्यासोबत असायचा. आता सविता यांना रूपलप्रमाणेच श्रेयही आपलासा वाटू लागला होता.

त्यांच्यासाठी दोघेही सारखेच होते. एमडी होताच दोघांचे लग्न होणार होते. हळूहळू सविता याही रमाला सोबत घेऊन छोटी-छोटी तयारी करत होत्या. हॉटेल बुकिंग, केटरर्स, डेकोरेटर यासारखी मोठी कामे मुलगा आणि सून करणार होते, पण छोटी तयारीच जास्त असते. त्यामुळे त्या रमाला सोबत घेऊन रोज जमेल तितकी तयारी करत होत्या. सविता यांचे लग्नाच्या तयारीचे काम दिवसेंदिवस वाढत होते.

आधीच घरचा सगळा भार त्यांच्यावर होता, त्यात आता लग्नाच्या तयारीचे अतिरिक्त कामही होते, पण इतक्या व्यस्त दिनक्रमातही त्यांच्या लक्षात आले की, रूपल काहीशी उदास राहू लागली होती. नवीन घरात जाण्याची भीती किंवा आपल्या जिवलग माणसांना सोडून जाण्याचे दु:ख यामुळे ती उदास आहे का…? ती अचानक असे उदास होण्यामागचे कारण काय? श्रेयही आजकाल पूर्वीसारखा आनंदी दिसत नव्हता. त्याचे घरी येणेही कमी झाले होते, आल्यावर तो पूर्वीसारखा मोकळेपणाने बोलत नव्हता. श्रेयला काही विचारणे त्यांना योग्य वाटले नाही, पण रूपलचे मन जाणून घेण्याचे त्यांनी ठरवले. जिच्या हसण्याने घराच्या भिंती आयुष्यभर हसत राहिल्या, तीच अचानक उदास झाली होती… ती या घरातून कायमची निघून जाणार, हा विचारही त्यांना सहन होत नव्हता.

एके दिवशी श्रेय जेवायला आला नाही, तेव्हा सविताने रूपलला खोलीत बोलावले आणि तिच्या उदास होण्यामागचे कारण विचारले. लग्नाला अवघे बारा दिवस उरले होते. समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते, आता यावर उपाय शोधणे आवश्यक होते. रूपलला जणू वाटतच होते की, आजीने तिला विचारावे आणि तिने मनात साचलेले सर्व आजीला सांगून टाकावे.

‘‘उदास होऊ नको तर आणखी काय करू आजी? श्रेयच्या आईची इच्छा आहे की, लग्नात मी त्यांच्या घरचा पारंपरिक ड्रेस आणि जाडसर बांगडया, जुनाट दागिने घालावेत, जे त्यांना त्यांच्या सासूने आणि त्यांच्या सासूला त्यांच्या सासूने दिले होते,’’ रूपलने सांगितले.

‘‘मग त्यात काय अडचण आहे?’’ सविता यांनी विचारले.

‘‘अडचण काहीच नाही आजी, तुला माहीत आहे, त्या लेहेंग्यावर सोन्या-चांदीची नक्षी आहे… खूप वजनदार आहे तो… त्यावर चार किलोचे दागिने आणि तेही दीडशे वर्ष जुने आहेत, आजकाल कोण घालते? मी इतका सुंदर लेहेंगा आणि नाजूक हलक्या वजनाचे दागिने आणले आहेत, पण त्यांच्याकडचे वधूचे कपडे आणि दागिने बघून मी नाराज झाले. मला खरंच लग्न करावेसे वाटत नाही,

आजकाल हे सर्व कालबाह्य झाले आहे हे त्यांना समजत नाही, रूपल पुटपुटली.

सविता यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, निदान प्रकरण गंभीर नाहीए.

‘‘श्रेयचे काय म्हणणे आहे?’’ त्यांनी विचारले.

‘‘काय बोलणार तो, आईला समजावणे त्याला जमत नाही आणि…’’ रूपलने उदास होत बोलणे अर्धवट सोडले.

सविता यांना श्रेयची अडचण समजली. त्याला आईचे मन मोडायचे नव्हते आणि रूपललाही नाराज करायचे नव्हते. बिचारा, दोघींमध्ये अडकला होता. रूपलचीही काहीच चूक नव्हती. ती पहिल्यापासून अभ्यासात व्यस्त होती. आता डॉक्टर झाली होती. साजशृंगारासाठी तिच्याकडे वेळ नव्हता आणि त्याची तिला तितकीशी आवडही नव्हती. ती खूप साधी, पण नीटनेटकी राहायची, आता एवढे वजनदार कपडे आणि दागिने पाहून ती घाबरून जाणे स्वाभाविक होते.

सविता यांनी क्षणभर विचार केला आणि मग म्हणाल्या, ‘‘तू श्रेयच्या आई मीरा यांच्याशी बोललीस का, त्यांना तू आणलेला लेहेंगा आणि दागिने दाखवून तुला हे घालायचे आहेत असे सांगितलेस का?’’

‘‘सांगितले, त्यांनाही ते आवडले, पण त्या म्हणाल्या की, लग्नातील इतर कुठल्याही विधीत इतके हलके दागिने घाल, पण लग्नात मात्र त्यांनी दिलेलेच घालावे लागेल. तूच सांग, त्या दीडशे वर्ष जुन्या पोशाखात मी कशी दिसेन…? मला नाही जमणार,’’ रूपल पुन्हा उदास झाली.

श्रेयच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवले आहे, त्यांच्याही काही इच्छा असतील ना? त्या पारंपरिक सनातनी कुटुंबातील सून आहेत, त्यांनाही त्यांच्या नात्यांचा आदर ठेवावाच लागेल ना? पण तरीही या समस्येवर उपाय असू शकतो, सविता म्हणाल्या.

‘‘कोणता उपाय?’’ रुपलने त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहिले.

‘‘आजकाल एक नवीन ट्रेंड आहे, ज्याला लग्नापूर्वीचे फोटोशूट म्हणतात. आपणही तुमचे असे फोटोशूट करून घेऊया, त्याच दागिने आणि कपडयांमध्ये जे तू घालावेस, असे श्रेयच्या आईला वाटतेय. जर ते तुला चांगले किंवा आरामदायक वाटत नसतील, तर मी श्रेयच्या आईला समजावेन, तुला ते लग्नात घालावे लागणार नाहीत, असे मी तुला वचन देते. जर ते तुझ्यावर चांगले दिसत असतील तर मात्र तू ते लग्नात आनंदाने घालू शकशील. रूपल बघ, नात्याला दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे लागते. श्रेयच्या आईने तुमच्या भावना जपायला हव्यात, त्याचप्रमाणे तुलाही पुढाकार घेऊन त्यांच्या भावना आणि इच्छांचा आदर करायला हवा, तरच श्रेयलाही आनंद होईल,’’ सविता यांनी समजावत सांगितले.

‘‘ठीक आहे आजी, जसे तू सांगशील. मी तुझे सर्व ऐकेन,’’ रूपल हसत म्हणाली. तिला आता मन मोकळे झाल्यासारखे वाटत होते.

सविता या श्रेय आणि त्याच्या आईशी बोलल्या. त्या दोघांनीही आनंदाने त्यांचे म्हणणे मान्य केले. दोन दिवसांनी त्या रूपलला घेऊन श्रेयच्या घरी गेल्या. त्यांनी श्रेयच्या आईसोबत रूपलची तयारी केली. जेव्हा रूपलने स्वत:ला पारंपरिक पोशाखात आरशात पाहिले तेव्हा ती स्वत:च तिच्या रूपाने मोहित झाली. ती खूप सुंदर दिसत होती.

रूपलचे सौंदर्य पाहून श्रेयचेही डोळे चमकले. रूपल इतकी सुंदर दिसेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. श्रेयची आई आणि सविता दोघीही तिच्या सौंदर्याकडे पाहातच राहिल्या. सविता यांनी घाईघाईने रूपलला काळा तीट लावला. मुलगी कितीही सुशिक्षित किंवा आधुनिक असली तरी ती वधू बनते तेव्हा भारतीय पारंपरिक पोशाख आणि साजशृंगारात सुंदर दिसते. श्रेयची आई मीरा या रूपलच्या दिसण्याचे कौतुक करू लागल्या. भारतीय वधू या जगातील सर्वात सुंदर वधू दिसतात.

छायाचित्रकार बराच वेळ रूपलचे फोटो काढत राहिला. त्यानंतर त्याने श्रेय आणि मीरा तसेच सविता यांच्यासोबत तिचे फोटो काढले. शूट पूर्ण झाल्यानंतर मीरा यांच्या लक्षात आले की, जड नथीमुळे रूपलचे नाक लाल झाले आहे आणि कंबरपट्ट्याच्या वजनामुळे तिचा लेहेंगा पुन्हा पुन्हा खाली येत आहे.

‘‘तू ही नथ घालू नकोस. लग्नाच्या दिवशी तुला काही त्रास व्हावा, असे मला वाटत नाही. लग्नासाठी आपण अमेरिकन डायमंडची छोटी नथ घेऊ. तसेही लग्नानंतर कोणीच नथ घालत नाही आणि हा जड कंबरपट्टाही राहू दे, तो आजच्या काळात शोभून दिसत नाही,’’ मीरा यांनी रूपलची नथ काढली आणि कंबरपट्टा तसेच केसांमध्ये लावलेले दोन-चार जुन्या पद्धतीचे दागिने वेगळे केले, जे शोभून दिसत नव्हते.

‘‘जर ही पैंजण खूप वजनदार वाटत असेल तर नवीन आणलेली हलक्या वजनाची घाल,’’ मीरा म्हणाल्या.

‘‘नाही आई, मी हीच घालेन, ती खूप सुंदर आहे,’’ रूपल म्हणाली.

‘‘ठीक आहे माझ्या बाळा, आजच्या आधुनिक काळातली असूनही तू आपल्या परंपरांचा इतका आदर करतेस, हे पाहून मला खूप आनंद झाला,’’ मीरा यांनी आनंदाने रूपलला मिठी मारली.

मीरा दागिने आणि कपडे ठेवायला आत गेल्यावर रूपल पटकन सविता यांच्या गळयाला बिलगली. ‘‘आभारी आहे आजी, तू फक्त माझ्या लग्नाचा दिवस आनंदी केला नाहीस, पण जीवनातील सर्वात महत्त्वाचे तत्त्वज्ञानही सांगितलेस की, जर आपण इतरांच्या भावनांचा आदर केला तर त्या बदल्यात नात्यातील गोडवा वाढतो. खूप प्रेमही मिळते. तू खरंच माझा दीपस्तंभ आहेस. मी खूप भाग्यवान आहे की, तू माझा आजी आहेस.’’

‘‘फक्त रूपलच्याच नाही तर तुम्ही माझ्याही दीपस्तंभ आहात, आजी. तुम्ही एका फोटोशूटच्या बहाण्याने सगळयांच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्यात आणि त्यांना एकमेकांशी जोडलेत, नाहीतर लग्नाच्या एका दिवसातील अनावश्यक राग-रुसव्यामुळे आयुष्यभर नात्यात कटुता निर्माण झाली असती. खूप खूप आभार, आजी,’’ श्रेय म्हणाला. सविता यांनी हसून दोघांनाही आपल्या मिठीत घेतले.

पडद्याआड उभ्या असलेल्या मीरा त्या तिघांकडे पाहून प्रेमाने हसून जणू म्हणत होत्या की, ‘‘आमच्या सर्वांच्या आयुष्यातील दीपस्तंभा, धन्यवाद.’’

उपेक्षा

कथा * कुमुद भोरास्कर

आज प्रथमच अनुभाला जाणवलं की नेहमी मैत्रिणीमध्ये किंवा बहिणीप्रमाणे वागणाऱ्या तिच्या आईचं अन् अनिशा काकूचं वागणं काही तरी वेगळं वाटतंय. अनिशा काकू जरा टेन्शनमध्ये दिसत होती.

आईनं वारंवार तिला विचारलं, तेव्हा तिनं जरा बिचकतच सांगितलं, ‘‘माझा चुलतभाऊ सलील इथं टे्निंगसाठी येतो आहे. तशी त्याची राहण्याची व्यवस्था त्यांच्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली आहे, पण सुट्टीच्या दिवशी सणावाराला तो इथं येईल.’’

‘‘तर मग इतकी काळजीत का आहेस तू? नाही आला तर आपण त्याला गाडी पाठवून बोलावून घेऊ.’’ शीतलनं, अनुभाच्या आईने उत्साहात म्हटलं.

‘‘काळजीचीच बाब आहे शीतल वहिनी. माझ्या आईनं मला फोनवर समजावून सांगितलं आहे, तुझ्या घरात तुझ्या तरूण पुतण्या आहेत, त्यांच्या मैत्रीणी घरी येतील जातील. अशावेळी सलीलसारख्या तरूण मुलाचं तुझ्या घरी येणं बरोबर नाही…’’

‘‘पण मग त्याला ‘येऊ नको’ हे सांगणं बरोबर आहे का?’’

‘‘तेच तर मला समजत नाहीए…म्हणूनच मी काळजीत आहे. मी असं करते, सलीलला आल्या आल्याच सांगेन की निक्की अन् गोलूचा जसा तू मामा आहेस, तसाच अनुभा अजयाचाही मामा आहेस…म्हणजे अगदी प्रथमपासून तो या नात्यानं या तरूण मुलींकडे बघेल…’’ अनिशानं म्हटलं.

‘‘सांगून बघ. पण हल्लीची तरूण मुलं असं काही मानत नाहीत,’’ आता शीतलच्याही सुरात काळजी होती.

‘‘असं करूयात का? सलील येईल तेव्हा मी त्याला माझ्या खोलीतच घेऊन जाईन. म्हणजे घरात इतरत्र त्याचा वावर नकोच!’’ अनिशानं तोडगा काढला.

‘‘बघ बाई, तुला जसं योग्य वाटेल तसं कर, एवढंच बघ की सलीलचा अपमान होऊ नये अन् त्याला आपलं वागणं गैर वाटू नये…शिवाय काही वावगंही घडू नये.’’ शीतल अजूनही काळजीतच होती.

अनुभानं हे सर्व ऐकलं अन् ठरवलं की ती स्वत:च सलीलपासून दूर राहील. सलील आला की ती सरळ आपल्या खोलीत जाऊन बसेल म्हणजे काकूला अन् आईला उगीचच टेन्शन नको.

अमितकाकाच प्रथम सलीलला घरी घेऊन आला होता. सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. मग अनुभाशी ओळख करून देताना त्यानं म्हटलं, ‘‘अनु, हा तुझाही मामाच आहे हं. पण तुम्ही जवळपास एकाच वयाचे आहात, तेव्हा तुमच्यात मैत्री व्हायला हरकत नाही.’’

हे ऐकून पार हबकलेल्या आई व काकूकडे बघून अनुभानं त्यावेळी त्याला फक्त हॅलो म्हटलं अन् ती आपल्या खोलीत निघून गेली. पण तेवढ्या वेळात त्याचं देखणं रूप अन् मोहक हास्य तिच्या मनात ठसलं.

पुढे सलील एकटाच यायचा. त्याच्या मोटर सायकलचा आवाज आला की अनुभा खोलीत निघून जायची. पण तिचं सगळं लक्ष काकूच्या खोलीतून येणाऱ्या मजेदार गप्पांकडे अन् सतत येणाऱ्या हसण्याच्या आवाजाकडे असायचं.

सलीलजवळ विनोदी चुटक्यांचा प्रचंड संग्रह होता. सांगायची पद्धतही छान होती.

मोहननं ओळख करून देत म्हटलं, ‘‘हा माझा मित्र सलील आहे. अनु आणि सलील ही माझ्या बहिणीची, माधवीची खास मैत्रीण, अनुभा.’’

सलीलनं हसून म्हटलं, ‘‘मी ओळखतो हिला, मी मामा आहे हिचा.’’

‘‘खरंय? तर मग अनु, तू आता तुझ्या मामाला जरा सांभाळ. अगं आज प्रथमच तो माझ्या घरी आला आहे अन् मी फार कामात आहे. तेव्हा तूच त्याच्याकडे लक्ष दे. सर्वांशी त्याची ओळख करून दे. मला आई बोलावते आहे…मी जातो.’’ मोहन ‘‘आलो’’ म्हणत तिथून आत धावला.

सलीलनं खट्याळपणे हसत तिच्याकडे बघितलं अन् म्हणाला, ‘‘माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का प्लीज? मी दिसायला इतका कुरूप किंवा भितीदायक आहे का की माझी चाहूल लागताच तू तडक तुझ्या खोलीत निघून जातेस? मला किती त्रास होतो या गोष्टीचा?’’

अभावितपणे अनु बोलून गेली, ‘‘त्रास तर मलाही खूप होतो. लपावं लागतं म्हणून नाही तर तुला बघू शकत नाही, म्हणून.’’

‘‘तर मग बघत का नाहीस?’’

अनुभानं खरं कारण सांगितलं. आईचं व काकूचं टेंशन सांगितलं.

‘‘असं आहे का? खरं तर माझ्या घरीही हेच टेंशन होतं. मी इथं येतोय म्हणताना माझ्या आईला अन् काकुलाही हेच वाटत होतं…पण तुझ्या काकांनी तर आपल्यात मैत्री होऊ शकते असं सांगितलं. मग माझ्यासमोर येऊ नकोस हे कुणी सांगितलं?’’

‘‘तसं कुणीच सांगितलं नाही. पण काकांचं बोलणं ऐकून काकू आणि आई इतक्या हवालदिल झाल्यात की त्यांचं टेंशन वाढवण्यापेक्षा मी स्वत:ला तुझ्यापासून दूर ठेवणंच योग्य मानलं.’’

‘‘हं!’’ सलीलनं म्हटलं, ‘‘तर एकूण असं आहे म्हणायचं. तुझ्या घरून कुणी येणार आहेत का आज इथल्या कार्यक्रमाला?’’

‘‘आई, अनूकाकू येणार आहेत ना?’’

‘‘तर त्या यायच्या आत तू आपल्या सर्व मैत्रीणींशी माझा मामा म्हणूनच ओळख करून दे. त्यामुळे माझ्या ताईला म्हणजे तुझ्या काकूलाही जाणवेल की मी नाती मानतो.’’

माधवी अन् इतर मुलींनाही हा तरूण, सुंदर अन् हसरा, हसवणारा मामा खूपच आवडला. शीतल अन् अनिशा जेव्हा कार्यक्रमात पोहोचल्या, तेव्हा सलील धावून धावून खूप कामं करत होता अन् लहान मोठे सगळेच त्याला मामा म्हणून बोलावत होते.

‘‘हे सगळं काय चाललंय?’’ अनिशाने विचारलं.

‘‘बहिण्याच्या शहरात येण्याचा प्रसाद आहे हा.’’ सलील चेहरा पाडून म्हणाला.

‘‘मला वाटलं होतं या शहरात चांगल्या पोरी भेटतील, गर्लफ्रेंड मिळेल पण अनुभाच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या भाच्याच झाल्यात. राहिली साहिली ती माधवी, माझ्या मित्राची बहिण, तीही मला मामाच म्हणतेय. आता भाचीला गर्लफ्रेंड कसं म्हणायचं? म्हणून काम करतोय, मामा झालोय अन् आशिर्वाद गोळा करतोय.’’

शीतल तर हे ऐकून एकदम गदगदली. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यावर आमंत्रित पाहुण्यांची जेवणं झाली. शीतलनं अनुभाला घरी चालण्याबद्दल विचारलं, तेव्हा माधवी म्हणाली, ‘‘अजून आमची जेवणं नाही झालेली. आम्ही सर्व व्यवस्था बघत होतो…एवढ्यात नाही मी जाऊ देणार अनुभाला.’’

‘‘एकटी कशी येणार?’’

माधवीची आई म्हणाली, ‘‘एकटी कशानं? मामा आहे ना? तो सोडेल.’’

शीतलनं विचारलं, ‘‘सलील, अनुभाला घरी सोडशील.’’

‘‘सोडेन ना ताई, पण आमची जेवणं आटोपल्यावर. यांचा नाचगाण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे बराच उशीर होईल.’’

‘‘तुम्ही हवं तेवढा वेळ थांबा. मग भाचीचा कान धरून तिला घरी आणून सोड. मामा आहेस तू तिचा.’’ हसत हसत शीतलनं म्हटलं.

शीतलनं असा हिरवा कंदिल दाखवल्यावरदेखील अनुभा सलील यायचा, तेव्हा आपल्या खोलीतच दार लावून बसायची. त्याच्याबद्दल कधी काही ती विचारत नसे की बोलत नसे. पण सलीलला ज्या दिवशी सुट्टी असायची, त्यादिवशी ती मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते असे सांगून बाहेरच्या बाहेर सलीलला भेटायची. माधवीलाही कधी संशय आला नाही. कॉलेजच्या परीक्षा संपता संपता घरात अनुभाच्या लग्नाची चर्चा झाली.

तिनं सलीलला सांगितलं.

सलील म्हणाला, ‘‘मलाही तुझ्या आई आणि काकूनं तुझ्यासाठी मुलगा बघायला सांगितलं आहे.’’

‘‘मग तू स्वत:चंच नाव सुचव ना?’’

‘‘वेडी आहेस का? मी इथं येण्यापूर्वी इतकं टेंशन दोन्ही घरांमध्ये होतं ते एवढ्यासाठीच की मी तुझ्या प्रेमात पडून लग्न करण्याचा हट्ट धरला तर केवढा अनर्थ होईल. ज्या घरात मुलगी दिली, त्या घरातली मुलगी करत नाहीत.’’

‘‘तू हे सर्व मानतोस?’’

‘‘मी मुळीच मानत नाही. पण आपल्या कुटुंबातल्या मान्यता अन् परंपरा मी मानतो. त्यांचा आदर करतो.’’

‘‘तुला माझ्या या प्रेमाची किंमत नाहीए?’’

‘‘आहे ना? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही करू शकत नाही मी.’’

‘‘तू पुरूष आहेस, तेव्हा लग्न न करण्याचा तुझा हट्ट किंवा जिद्द तुझे घरातले लोक चालवून घेतील. मला मात्र लग्न करावंच लागेल…’’

‘‘लग्न तर मी ही करेनच ना अनु?’’

अनुभा वैतागली. काय माणूस आहे हा? माझ्या खेरीज दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही असह्य होतेय याला अन् तरीही हा लग्न करणारच? तिनं संतापून त्याच्याकडे बघितलं.

तिच्या मनातले भाव जाणून सलील म्हणाला, ‘‘लग्न कुणाबरोबर का होईना, पण माझ्या अन् तुझ्या मनात आपणच दोघं असू ना? आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवताना आपण हाच विचार सतत मनात ठेवायचा की तू अन् मी एकत्र आहोत…एकमेकांचे आहोत…’’

अनुभानं स्वत:च्या मनाची समजूत काढली की आता जशी ती सलीलच्या आठवणीत जगते आहे, तशीच लग्न झावरही जगेल. उलट जेव्हा लग्नानंतर भेटण्याचा प्रसंग येईल, तेव्हा भेटी अधिक सहज सुलभ होतील. कारण विवाहितांकडे संशयानं बघितलं जात नाही.

तिनं हे जेव्हा सलीलला सांगितलं, तेव्हा तो एकदम उत्साहानं म्हणाला, ‘‘व्वा! हे तर फारच छान! मग तर चोरून कशाला? उघड उघड, राजरोस सगळ्यांच्या समोर गळाभेट घेईन, कुठं तरी फिरायला जाण्याच्या निमित्तानं हॉटेलात जेवायला नेईन.’’

लवकरच दुबईला स्थायिक झालेल्या डॉ. गिरीशबरोबर अनुभाचं लग्न ठरलं. दिसायला तो सलीलपेक्षाही देखणा होता. भरपूर कमवत होता. स्वभावानं आनंदी, प्रेमळ अन् अतिशय सज्जन होता. पण अनुभा मात्र त्यांच्यात सलीललाच बघत होती. लग्नाला अनिशाकाकूच्या माहेरची खूप मंडळी आली होती. संधी मिळताच एकांतात अनुभानं सलीलला भेटून म्हटलं, ‘‘आपल्या प्रेमाची खूण म्हणून, आठवण म्हणून मला काहीतरी भेटवस्तू दे ना.’’

‘‘अगं, देणार होतो, पण अनिशाताईनं म्हटलं, ‘‘घरून आईनं भक्कम आहेर पाठवला आहे, तू वेगळ्यानं काहीच द्यायची गरज नाही.’’

अनुभाला खरं तर राग आला. अरे आईनं काही आहेर पाठवणं अन् तू भेटवस्तू देणं यात काही फरक आहे की नाही? आईनं आहेर केला, तरी ती अजीजीनं म्हणाली, ‘‘तरीही, काही तरी दे ना. ज्यामुळे तू सतत जवळ असल्याची भावना मनात राहील.’’

सलीलनं खिशातून रूमाल काढला. त्याचं चुबंन घेतलं अन् तो अनुभाला दिला. अनुभानं तो डोळ्यांना लावला अन् म्हणाली, ‘‘माद्ब्रया आयुष्यातली ही सर्वात मौल्यवान वस्तू असेल.’’

सुरूवातीपासूनच अनुभा गिरीशला सलील समजून वागत होती. त्यामुळे तिला काहीच त्रास झाला नाही. उलट त्यांचं नातं खूपच खेळीमेळीचं अन् प्रेमाचं झालं. ती गिरीशबरोबर सुखी होती. तिनं ठरवलं होतं की सलील भेटला की त्याला सांगायचं, ‘‘फॉम्युला सक्सेसफुल!’’ पण सांगायची संधीच मिळाली नाही. नैनीतालला हनीमून साजरा करून ती माहेरी आली तेव्हा गोलूला सलीलची मोटरसायकल चालवताना बघून तिनं विचारलं, ‘‘सलीलमामाची मोटरसायकल तुझ्याकडे कशी?’’

‘‘सलीलमामाकडून पप्पांनी विकत घेतलीय, माझ्यासाठी.’’

‘‘पण त्यानं विकली कशाला?’’

‘‘कारण तो कॅनडाला गेलाय.’’

अनुभा एकदम चमकलीच! ‘‘अचानक कसा गेला कॅनडाला?’’

‘‘ते मला काय ठाऊक?’’

कसंबसं अनुभानं स्वत:ला सावरलं. सायंकाळी ती माधवीकडे भेटायला गेली. तिला खरं तर मोहनकडून सलीलबद्दल जाणून घ्यायचं होतं.

तिनं मोहनला विचारलं, ‘‘माझ्या लग्नात आला होता तेव्हा सलीलमामा काहीच बोलला नव्हता. एकाएकी कसा काय कॅनडाला निघून गेला?’’

‘‘पहिल्यांदा जाताना कुणीच एकाएकी परदेशात जात नाही अनु, सलील इथं त्याच्या कंपनीच्या हेडऑफिसमध्ये कॅनडाला जाण्याआधी खास टे्निंग घ्यायलाच आला होता. टे्निंग संपलं आणि तो कॅनडाला गेला. सगळं ठरलेलं होतं.’’ मोहन म्हणाला.

‘‘तुझ्याकडे त्याचा फोननंबर असला तर मला दे ना.’’ अनुनं म्हटलं.

‘‘नाही गं, अजून तरी त्याचा मला फोन आलेला नाही…’’

खट्टू होऊन ती घरी परतली. दोनच दिवसात तिला दुबईला जायचं होतं. नव्या आयुष्यात ती सुखात होती. पण कायम सलीलच्याच आठवणीत राहून, त्यानं दिलेल्या रूमालाचे पुन्हा पुन्हा मुके घेत.

एकदा गिरीशनं तिच्या हातात तो रूमाल बघितला अन् तो म्हणाला, ‘‘इतका घाणेरडा रूमाल तुझ्या हातात शोभत नाही. एका डॉक्टरची बायको आहेत तू. फेक तो रूमाल. डझनभर नवे रूमाल मागवून घे.’’ गिरीश सहजपणे बोलला पण अनुभा दचकली, भांबावली.

रूमाल फेकणं तर दूर ती त्या रूमालाला धुवतही नव्हती. कारण सलीलनं त्या रूमालाचं चुंबन घेतलं होतं. तिनं तो रूमाल टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून लपवून ठेवला, निदान गिरीशच्या नजरेला पडायला नको.

गिरीशचं कुटुंब अनेक वर्षांपासून दुबईत स्थायिक झालं होतं. जुमेरा बीचजवळ त्यांचा मोठा बंगला होता. शहरात क्लिनिक्स अन् त्यांच्याच जोडीला मेडिकल शॉप्स होती. एक क्लिनिक गिरीश बघत असे. कुटुंबातल्या सगळ्याच स्त्रिया घरच्या धंद्यात काही तरी मदत करत होत्या.

अनुभाही थोरली जाऊ वर्षाच्यासोबत काम करू लागली. इथल्या आयुष्यात ती आनंदी होती, पण तिला हल्ली सलीलची आठवण फारच बेचैन करत होती. वांरवार त्या रूमालाचे मुके घ्यावे लागत होते.

एक दिवस वर्षाच्या चुलत बहिणीचा फोन आला. तिनं सांगितलं की तिच्या नवऱ्याचंही दुबईला पोस्टिंग झालंय. अजून ऑफिसनं गाडी आणि घर दिलं नाहीए. पण त्यांच्या राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलात केली आहे. गाडी मिळाली की भेटायला येईल. पण वर्षाला तर तिला भेटायची घाई झाली होती. अनुभानं सुचवलं की ऑफिसातून येताना त्या दोघी गाडीनं लताच्या हॉटेलात जातील, तिथून तिला आपल्या घरी आणायचं. तिच्या नवऱ्याचं ऑफिस सुटेल  तेव्हा आपला ड्रायव्हर त्याला ऑफिसमधून पिकअप करून घरी येईल. रात्रीचं जेवण सगळे एकत्रच घेतील, मग ड्रायव्हर त्या दोघांना पुन्हा त्यांच्या हॉटेलवर सोडेल. वर्षाला ही सूचना आवडली. दिवस ठरवून लताला फोन केला. तिनं अन् तिच्या नवऱ्यानं होकार दिला.

लताला वर्षानं विचारलं, ‘‘तू तर लग्नानंतर अमेरिकेला की कुठंतरी गेली होतीस, मग दुबईला कशी आलीस?’’

‘‘मला तिथली थंडी, तिथला बर्फ आवडत नव्हता म्हणून यांनी इथं बदली करून घेतली.’’ लतानं तोऱ्यात उत्तर दिलं.

‘‘अरे व्वा! खूपच दिलदार दिसतोए तुझा नवरा. बायकोसाठी डॉलर कमावायचे सोडून दिराम कमवायला लागला. ऐट आहे बुवा!’’ वर्षानं विचारलं.

‘‘माझ्यासाठी तर ते स्वत:चा जीवही देतील ताई.’’ लताच्या बोलण्यात दर्प होता.

वर्षा अन् अनुभाला हसायला आलं.

‘‘आणि या अशा जीव देणाऱ्या मुलाशी तुझं लग्न ठरवलं कुणी? गोदाकाकींनी?’’ वर्षांनी विचारलं.

लता हसायला लागली, ‘‘नाही ताई, गोदाकाकी तर या सोयरिकीच्या विरोधातच होत्या. त्यांचं म्हणणं होतं की मुलगा जरा भ्रमरवृत्तीचा आहे, खूप मुलींशी त्याची प्रेमप्रकरणं झालीत. असा मुलगा आपल्याला नकोच,’’ पण काका म्हणाले, ‘‘लग्नाआधी मुलं अशीच टाइमपास असतात. लग्नानंतर ती व्यवस्थित वागायला लागतात.’’

‘‘तुमचे ‘ते’ तुम्हाला त्यांच्या आधीच्या प्रेमिकेच्या नावानं नाही का बोलावत? काही खास नाव घेऊन बोलालतात?’’ अनुभानं विचारलं.

‘‘नाही बाई, ते मला लताच म्हणतात.’’

‘‘याचा अर्थ तुमचे ‘ते’ फक्त तुमचेच आहेत.’’

सायंकाळी गिरीशला क्लिनिकमध्ये फारसं काम नव्हतं. असिस्टंट डॉक्टरला   सूचना देऊन तो लवकर घरी परतला. वर्षानं म्हटलं, ‘‘गिरीश, मी लताला जुमेरा बीचवर फिरवून आणते. अनुभा बाकीची व्यवस्था बघतेय. लताचे मिस्टर आले की तुम्ही त्यांना रिसीव्ह करा. आम्ही थोड्या वेळात घरी येतोच आहोत.’’ त्या दोघी निघून गेल्या.

काही वेळातच गिरीशचा उल्हसित आवाज कानी आला, ‘‘अगं अनु, बघ लताचे मिस्टर आलेत. ते कोण आहेत माहीत आहे का? तुझे सलील मामा.’’

ते ऐकताच अनुभाचा उत्साह, उल्हास फसफसून आला. धावतच ती ड्रॉइंगरूममध्ये आली. खरंच, सलीलच होता. अंगानं थोडा भरला होता.

‘‘घ्या, तुमची भाची आली…’’ गिरीशनं म्हटलं.

सलीलनं अनुभाकडे दुर्लक्ष करत म्हटलं, ‘‘पण माझी बायको कुठाय?’’

‘‘ती तिच्या बहिणीबरोबर बीचवर गेली आहे. येईलच, तोवर तुमच्या भाचीशी गप्पा मारा.’’

‘‘गप्पा तर मारूच, मामा आधी गळाभेट तरी घे.’’ अनुभानं त्याच्याजवळ जात म्हटलं.

‘‘लहान बाळासारखी मामाच्या मांडीवर बसू नकोस हं!’’ गिरीश गमतीनं म्हणाला.

‘‘माझ्या बायकोला मांडीवर बसवून तिच्या डोळ्यात मला बघायचाय समुद्र.’’ सलील उतावळेपणानं म्हणाला, ‘‘गिरीश, आपण समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ. तुम्ही वर्षावहिनींना घरी घेऊन या. मी अन् लता थोडावेळ समुद्र किनाऱ्याजवळ एकांतात घालवू, चला ना गिरीश…लवकर…प्लीज’’

इतकी उपेक्षा, इतका अपमान! अनुभाला ते सहन होईना…संतापानं ती आपल्या खोलीकडे धावली. एकट्यानं रडावं म्हणून नाही तर सलीलनं दिलेल्या रूमालाच्या चिंध्या चिंध्या करून फेकण्यासाठी…तो तिच्यासाठी अनमोल, अमूल्य असणारा रूमाल आता तिला ओकारी आणत होत, नकोसा झाला होता.

अंतरी उजळले दिवे

* सुरेखा सावे

ऑफिसातून घरी परतताना रात्रीचे आठ वाजून गेले होते. घरात शिरताच प्रतिमाचा बिघडलेला मूड श्रवणला जाणवला. कारण एरवी हसून स्वागत करणारी प्रतिमा बरीच काळजीत दिसत होती. दिवसभरातल्या आळीतल्या, घरातल्या सर्व वितंबातम्या आल्या आल्या श्रवणला सांगून मगच ती इतर कामाला लागायची. पण आज तिनं मुकाट्यानं चहाचा कप पुढ्यात ठेवला.

तिची क्षमा मागत श्रवणनं म्हटलं, ‘‘सॉरी, मी तुला फोन करू शकलो नाही…अगं महिन्याच्या शेवटच्या दिवशी ना, काम जरा जास्तच असतं…’’

‘‘तुमच्या कामाची कल्पना आहे मला…पण मला दुसरीच काळजी सतावते आहे…’’ प्रतिमा म्हणाली.

‘‘अरे? आम्हालाही कळू देत काय दु:ख आहे माझ्या चंद्रमुखीला.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘दुपारी मोठ्या वहिनींचा फोन आला होता अमेरिकेहून, उद्या सायंकाळी सासूबाई इथं पोचताहेत…’’

‘‘हात्तिच्या! एवढंच ना? मग त्यात काळजीचं काय कारण आहे? आईचं घर आहे ती केव्हाही येऊ शकते ना?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘तुम्हाला समजत नाहीए. अमेरिकेत राहून त्या खूपच कंटाळल्या. आता त्या इथंच राहायचं म्हणताहेत…’’ प्रतिमा अजूनही काळजीत होती.

‘‘तर मग छानच झालं की! घरात चैतन्य वाढेल. भांडी जास्त आवाज करतील. एकता कपूरच्या सीरियल्सबद्दल तुला चर्चा करायला रसिक श्रोता मिळेल. सासवासुना मिळून आळीतल्या महिला मंडळात धमाल कराल…हा…हा…हा…’’

‘‘तुम्हाला सगळी चेष्टाच वाटतेय. माझ्या जिवाला घोर लागलाय.’’ प्रतिमानं म्हटलं.

‘‘अगं राणी, घोर तर माझ्या जिवाला लागायला हवा. तुम्हा सासूसुनेच्या शीतयुद्धात मीच हुतात्मा होतो. जात्यातल्या धान्यासारखी अवस्था असते माझी. तुला काही म्हणू शकत नाही की आईला काही म्हणू शकत नाही…’’

प्रतिमा गप्पच होती. थोडा वेळ थांबून श्रवणनं म्हटलं, ‘‘तुला एक सुचवू का? पटलं तर बघ, काही टीप्स देतोय…मला वाटतं तुझं टेंशन त्यामुळे संपेल.’’

प्रतिमानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. मागच्या वेळी सासूबाई क्षुल्लक कारणावरून नाराज होऊन इथून गेल्या होत्या. ती कडू आठवण मनांत ताजी होती.

‘‘हे बघ प्रतिमा, जोपर्यंत बाबा हयात होते तोवर मला आईची काळजी नव्हती. पण बाबा गेल्यावर आलेला एकटेपणा तिला पेलवंत नाहीए. तिला खूप असुरक्षित, एकाकी वाटतं. तूच विचार कर, ज्या घरात तिचं एकछत्री साम्राज्य होतं, ते घर आता नाही. लग्नानंतर मुलांचा ताबा सुनांनी घेतला. जे घर तिनं काडी काडी जोडून तयार केलं होतं, ते बाबांच्या मृत्युनंतर बंद करावं लागलं…

‘‘आईला एकटं ठेवायचं नाही म्हणून मग ती इथं अन् दादाकडे अमेरिकेला राहते…म्हणजे तिला राहावं लागतं. इथं तिला मोकळेपणा वाटत नाही. त्यामुळे तिची चिडचिड होते. गावातल्या घरात असलेला मोकळेपणा, तिची सत्ता इथं तिला मिळत नाही. मनांतला असंतोष संधी साधून उफाळून येतो…’’

प्रतिमाला श्रवणचं बोलणं पटत होतं. ती लक्षपूर्वक ऐकत होती.

‘‘एक लक्षात घे, आईला आपल्याकडून पैसा अडका नकोए. बाबांची पेन्शन तिला पुरून उरते. तिला थोडी विचारपूस, थोडा मानसन्मान हवा असतो. तेवढं मिळालं की ती खुष होते. थोडी तडजोड तुला करावी लागेल. करशील का?’’

‘‘करेन, प्रयत्न तरी नक्कीच करेन.’’

‘‘असं बघ,’’ श्रवण पुढे बोलू लागला. ‘‘अगं या वयस्कर लोकांमध्ये ‘अहं’ फार असतो. तसा तो आपल्यातही असतोच. पण दोघांचे अहंकार एकमेकांना भिडले की प्रचंड स्फोट होतो. कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं, मनं दुभंगतात अन् अगदी कारण नसताना माणसं एकमेकांची वैरी होतात. आपण फक्त एवढीच काळजी घ्यायची की आईचा अहंकार दुखावला जाणार नाही, आई तशी प्रेमळ आहे गं! अजून तुला तिचा फारसा सहवासच मिळाला नाहीए. पण तुझ्या सेवेनं, तुझ्या नम्र वागण्यानं, तुझ्या गोड बोलण्यानं तू तिला जिंकून घेशील याची मला खात्री आहे.’’

‘‘म्हणजे मी नेमकं काय करायचं?’’

‘‘अगदी सोप्पं आहे. आईसमोर दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन वावरायचं, तिला वाकून नमस्कार करायचा. तिला काय हवं नको याकडे जातीनं लक्ष द्यायचं. रात्री झोपण्यापूर्वी तिचे दुखरे पाय चेपायचे, बघ ती कशी हुरळून जातेय ती.’’

‘‘करेन की! लक्षात ठेवून सर्व करेन.’’ प्रतिमा आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती.

‘‘आणि एक गोष्ट…प्रत्येक काम करण्याआधी आईला विचारून घेत जा. घरात घडणार तेच आहे जे तुला अन् मला हवंय, पण तिचा विचार घेतला, तेवढा मोठेपणे तिला मिळाला की तिचं प्रेमळ मन सुखावतं. तिच्या म्हणण्याला मान दिलास की बघ ती तुझे कसे लाड करेल…’’

‘‘तुम्ही बघाल, यावेळी मी त्यांना तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही.’’

रात्रीची जेवणं आटोपल्यावर प्रतिमानं थोडा वेळ बसून पुढील काही दिवसांच्या कामाचं वेळापत्रक आखून घेतलं. रात्री अगदी शांत झोप लागली तिला.

सकाळी लवकर उठून तिनं सासूबाईची खोली अगदी झकास स्वच्छ करून घेतली. त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू आवर्जून तिथं मांडल्या. त्यांना आवडणाऱ्या भाज्या फ्रीजमध्ये विराजमान झाल्या.

वेळेवारी प्रतिमा आणि श्रवण एयरपोर्टवर पोहोचले. मुलगा सून दिसताच आईचे डोळे आनंदानं चमकले. त्यांची ट्रॉली स्वत:कडे घेत प्रतिमानं वाकून नमस्कार केला. आईला कृतार्थ वाटलं. तिनं तोंडभरून आशिर्वाद दिला.

नातू दिसला नाही तेव्हा आजीनं विचारलं, ‘‘सुनबाई नातू दिसत नाहीए गं?’’

‘‘आई, तो झोपला होता…म्हणून कामवाल्या काकूंना घरी बसवून तुम्हाला घ्यायला आले.’’

‘‘अगं, मुलांना असं गडीमाणसांवर सोपवू नये. हल्ली काय न् काय ऐकायला येतं ना?’’ आई म्हणाल्या.

‘‘खरंय आई, यापुढे लक्षात ठेवेन.’’ प्रतिमानं आश्वासन दिलं.

घरी पोहोचताच पाच वर्षांचा नातू धावत आला अन् त्यानं आजीला मिठी मारली. आजीला त्यानं आजीची खोली दाखवली. स्वच्छ नीटनेटकी मांडलेली खोली व आकर्षकरित्या मांडलेलं सामान बघून आई सुखावल्या.

‘‘आई तुम्ही स्नान करणार आहात की आत्ता फक्त हातपाय तोंड धुताय?’’

गरम चहाचा कप सासूच्या हातात देत सुनेनं विचारलं.

‘‘मला वाटतं मी स्नान केलं की माझं आखडलेलं अंग मोकळं होईल. विमानात बसून दमले गं बाई!’’ सासूबाई चहा घेता घेता बोलत होत्या.

स्नानगृहात दोन बादल्या सणसणीत गरम पाणी स्वच्छ पंचा, सुगंधी साबण सगळी जय्यत तयारी होती.

रात्रीची भाजी आईंना विचारून केली होती. स्वयंपाक छान होता. सासूबाई मनापासून जेवत होत्या. नातू शेजारीच जेवायला बसला होता. सून गरम फुलके करून वाढत होती.

जेवताना मुद्दामच श्रवणनं म्हटलं, ‘‘प्रतिमा, उद्या नाश्त्याला भाजणीचं थालीपीठ कर ना. पण आईला नीट विचारून घे. छान खुसखुशीत व्हायला हवं.’’

‘‘आई, उद्या मला जरा सांगाल हं…’’ प्रतिमानं म्हटलं. आई सुखावल्या.

आईंच्या खोलीची स्वच्छता मोलकरणीकडून न करवता प्रतिमा स्वत:च करायची. कारण आईंना प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ, व्यवस्थित व जागच्या जागी हवी असायची. मोलकरीण इतक्या निगुतीनं सगळं करेल हे शक्यच नव्हतं.

एक दोन दिवसांनंतर प्रतिमा आईंच्या खोलीत काहीतरी काम करत असताना एक फाइल सापडत नाही यावरून श्रवणनं घर डोक्यावर घेतलं. प्रतिमा त्यावेळी आईंचे वाळलेले कपडे घड्या घालून ठेवत होती. आई म्हणाल्या, ‘‘अगं, ते सोड ते काम. तो बघ काय म्हणतोय, सगळं घर डोक्यावर घेतलंय.’’

अंघोळीच्या आधी डोक्याला व अंगाला तेल लावायची सवय होती आईंना. त्यांच्यासाठी खास लाकडी घाण्यावरचं तेल प्रतिमानं आणून ठेवलं होतं. आईंना तेलाची बाटली हातात घेताच प्रतिमा म्हणाली, ‘‘आई, मी लावून देते तेल…बघा माझ्या हाताची कमाल. खूप बरं वाटेल तुम्हाला.’’

‘‘राहू दे गं! तशीच घरातली, बाहेरची बरीच कामं असतात तुला…’’

‘‘कामं होतील हो,’’ म्हणत प्रतिमानं बाटली उघडून त्यांच्या डोक्याला तेल लावायला सुरूवात केली.

‘‘आई, अजूनही तुमचे केस किती छान आहेत. तरूण वयात तर तुम्ही ब्युटी क्वीनच असाल ना?’’

‘‘अगं, आमच्या वेळी अशी काही प्रस्थं नव्हतीच ना? पण श्रवणचे बाबा मला अधूनमधून चिडवायचे, तुझ्या कॉलेजातली किती मुलं तुझ्यावर मरत होती सांग बरं! बोलता बोलता या वयातही त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली.’’

प्रतिमाला गंमत वाटली. तिनं मुद्दाम त्यांना छेडलं.

‘‘हे म्हणत होते की त्यांचे बाबा तुम्हाला माहेरीही जाऊ देत नसत. एक दिवसही तुम्ही नसलात तर त्यांना करमत नसे…खरं आहे का हे?’’

आता मात्र आई चक्क लाजल्या. प्रेमानं तिला एक चापटी मारून म्हणाल्या, ‘‘चल, फाजिल कुठली, माझी चेष्टा करतेस काय? चल, निघ इथून…’’

हलक्या हातानं प्रतिमानं त्यांचं अंग रगडून दिलं. गरम पाण्याच्या अंघोळीनं त्या खूपच सुखावल्या. मनापासून सेवा करण्याचा आनंद प्रतिमालाही सुखावून गेला.

एक दिवस श्रवणनं ऑफिसातून येताना सिनेमाची दोन तिकिटं आणली. आईंना सिनेमा आवडत नसे. त्यांना नाटक बघायला आवडायचं. प्रतिमानं विचारलं, ‘‘आई सिनेमाला जायचंय आपल्याला…आवरून घ्या. तसा वेळ आहे अजून.’’

‘‘नाही गं! मुळात मला ना, सिनेमाची आवड नाही…असं कर, तुम्ही दोघं जा. बाळाला मी बघते.’’

प्रतिमा काही क्षण तिथेच घुटमळली. ‘‘खरंच, जा तू तेवढंच तुम्हा दोघांना एकत्र राहता येईल.’’ आई म्हणाल्या.

व्वा! आंधळा मागतो एक डोळा…तसं झालं. दोघं पिक्चर बघून आली तेव्हा आईंनी स्वयंपाक तयार ठेवला होता. प्रतिमाला आवडणारे भोपळ्याचे काप अन् श्रवणच्या आवडीची फणसाची भाजी! व्वा!! प्रतिमानं पटकन् गस पेटवला अन् तयार असलेल्या कणकेच्या फुलक्या लाटायला घेतल्या.

‘‘प्रतिमा, तू बैस श्रवणबरोबर, मी देते गरम फुलके.’’ आईंनी म्हटलं.

‘‘नको आई, सगळा स्वयंपाक एकटीनं केलात तुम्ही. तुम्हीच बसा. आता होताहेत फुलके.’’ प्रतिमानं म्हटलं.

श्रवणनं तोडगा काढला. ‘‘प्रतिमा तू पटापट फुलके कर. आपण सगळे एकत्रच जेवूयात.’’

एकाच टेबलवर सगळे एकत्र जेवायला बसले. आईंना खूपच छान वाटलं. त्यांचे डोळे पाणावले. ‘‘आई काय झालं?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘तुझ्या बाबांची आठवण आली. आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.’’ आई म्हणाल्या.

‘‘खरंय आई, पण आज हा आनंद ते तुमच्या डोळ्यांनी बघताहेत.’’ प्रतिमानं मृदु आवाजात म्हटलं.

मग ती श्रवणला म्हणाली, ‘‘अशी भाजी फक्त आईच बनवू शकतात. आई, तुमच्या हातची चव माझ्या हाताला आली पाहिजे.’’

‘‘तू ही छान करतेस गं स्वंयपाक,’’ आई म्हणाल्या.

‘‘मी तुमच्यासारखीच सुगरण होण्याचा प्रयत्न करतेय आई.’’ प्रतिमानं म्हटलं. श्रवण सासूसुनेचं सख्य बघून सुखावला होता. एकमेकांना मान देण्यानं घरात केवढं सुख भरभरून वाहत होतं.

दिवाळीचा बोनस घेऊन श्रवण घरी आला अन् त्यानं ते पाकीट प्रतिमाला दिलं. प्रतिमा म्हणाली, ‘‘आपण आईंना देऊयात. त्यांना बरं वाटेल.’’

आईंनी पाकीट बघितलं, ‘‘तुझे बाबा असाच बोनस आणून माझ्या हातात ठेवायचे. आता तू बोनसचे पैसे माझ्या सुनेला देत जा.’’ आई मनापासून म्हणाल्या.

आता प्रतिमालाही समजलं होतं की तिची सासू अत्यंत साधी, नीटनेटकेपणाची आवड असणारी, सुगरण अन् प्रेमळ बाई आहे. तिला पैसा, अडका, कपडा, लत्ता काहीच नकोय. सुर्देवानं तिचं आरोग्य चांगलं असल्यामुळे औषधांचाही खर्च नसतो. फक्त थोडी विचारपूस, थोडा मोठेपणा मिळाला की त्यांना सुरक्षित वाटतं. मुलाच्या बरोबरीनं त्या सुनेवर प्रेम करतात. नातू तर त्यांच्या काळजाचा तुकडा आहे.

दिवाळीची साफसफाई करताना प्रतिमा स्टुलावरून पडली. पाय मुरगळला. आईंनी तिला पलंगावर बसवलं. पायाला आयोडेक्स चोळलं. व्यवस्थित क्रेप बँडेज बांधलं.

‘‘वा, वा! सुनेनं सासूची सेवा करायची तर सूनच सेवा करवून घेतेय.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘गप्प रे!’’ आई त्याच्यावर डाफरल्या. ‘‘ही माझ्या मुलीसारखी आहे. मी तिची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची?’’

‘‘आई, मुलीसारखी का म्हणता? मी मुलगीच आहे तुमची.’’ प्रतिमानं म्हटलं. आईंना भरून आलं. तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, ‘‘खरंच म्हणतेस पोरी, मला मुलगी नव्हती. तुझ्या रूपानं मुलगी मिळाली.’’

आंबेहळदीचा लेप व भरपूर विश्रांती यामुळे लवकरच प्रतिमाचा पाय बरा झाला. दिवाळीचा उत्साह सगळ्यांनाच होता. सासूसुनेनं मिळून घराची सजावट बदलली. फराळाचे पदार्थही नेहमीपेक्षा जास्त केले. कारण एकमेकींची मदत होती. प्रतिमाला चिरोटे अन् अनरसे खूप छान जमत नसत. यावेळी तिनं आईंकडून त्यातले सर्व बारकावे समजून घेतले होते. दोन्ही पदार्थ छान जमले होते. आईंच्या संमतीनं तिनं यंदा तिच्या मैत्रिणींना फराळाला बोलावलं होतं. एक दिवस सोसायटीतल्या समस्त सासवाही फराळाला येणार होत्या.

‘‘माझा नंबर लागणार आहे की नाही?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘नाही!’’ सासूसून एकदमच बोलल्या अन् सगळे हसायला लागले.

तेवढ्यात अमेरिकेहून दादाचा फोन आला. नंदिनीनं काही तरी म्हटल्यावर आई दुखावल्या होत्या. नाराज होऊन इथं आल्या होत्या. नंदिनीला अन् दादाला फार पश्चात्ताप होत होता. आईची क्षमा मागायला ती दोघं दिवाळीतच येणार होती. दादा अन् नंदिनीवहिनीला आईला सरप्राइज द्यायचं होतं म्हणून ही गोष्ट कुणाला सांगू नये म्हणून दादानं बजावलं होतं. श्रवणला खूप आनंद झाला. कितीतरी वर्षांनी सगळे असे एकत्र दिवाळी साजरी करणार होते.

आपला आनंद आणि उत्साह लपवताना श्रवणला खूपच सायास पडत होते. प्रतिमानं विचारलंसुद्धा, ‘‘तुम्ही खूपच आनंदात आहात…काय विशेष घडलंय?’’

‘‘छे: कुठं काय? तुम्हा सासवासुनांचा आनंद, उत्साह अन् प्रेम बघून मलाही आनंद होतोय.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘दृष्ट नका लावू हं आमच्या प्रेमाला.’’ प्रतिमानं दटावलं.

नर्कचतुर्दशीची पहाटेची अभ्यंग स्नानं, फटाके, फराळ वगैरे आटोपले. सायंकाळी लक्ष्मीपूजन होतं. आईनं आपल्या सूटकेसची किल्ली प्रतिमाला दिली अन् त्यातून लाल रंगाचा मखमली बॉक्स काढून आणायला सांगितलं. प्रतिमानं डबा आईच्या हातात दिला. तसा तो उघडून आईनं त्यातून सोन्याचा भक्कम नेकलेस काढून प्रतिमाला दिला. ‘‘सूनबाई, हा हार तुझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी खास घडवून आणला होता. आता यावर तुझा हक्क आहे. रात्री पुजेच्यावेळी नक्की घाल.’’ आईंचे डोळे भरून आले.

प्रतिमानं तो हार हातात घेऊन कपाळाला लावला आणि आईला नमस्कार केला. आईनं मनापासून आशिर्वाद दिले.

सायंकाळी पुजेची तयारी मांडून झाली दिवे पणत्यांनी घरदार, अंगण परिसर उजळला. तेवढ्यात बाहेर टॅक्सी थांबली.

आई पूजेसमोर येऊन बसली तेवढ्यात दादावहिनी येऊन आईच्या पाया पडले. आईला वाटलं आम्ही दोघं आहोत, ‘‘चला, पूजा सुरू करूयात,’’ ती म्हणतेय तोवर तिच्या लक्षात आलं की आम्ही दोघं बाजूला होतो. तिच्या पायाशी दादावहिनी आहेत. ती चकित झाली. तिला अजिबात कल्पना नसताना अमेरिकेतून नातवंड, मुलगा, सुनेनं येऊन आनंदाचा, आश्चर्याचा धक्का दिला होता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

‘‘आई मला क्षमा करा,’’ नंदिनीवहिनीच्या डोळ्यांत अश्रू होते. आईनं तिला आवेगानं जवळ घेतली. तिचेही डोळे वाहत होते. पण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद होता. बाहेर दिवे लखलखत होते. इथे घरातही सर्वांच्या मनांत दीप उजळले होते.

अलिखित नियम

कथा * प्रा. रेखा नाबर

दादा अमेरिकेला जाणार हे समजल्यावर सर्वांपेक्षा म्हणजे अगदी त्याच्यापेक्षासुद्धा जास्त आनंद मला झाला. का माहिती आहे? मला आता त्याचे जुने कपडे, बुट वापरावे लागणार नाहीत या कल्पनेने. तोपर्यंत कायम मी त्याचे वापरून जुने झालेले कपडे, बूट आणि पुस्तकेसुद्धा वापरत होतो. फक्त दिवाळीला आई मला कपडे घेई. जुन्या वस्तू वापरणे मला नकोसे होई. त्याबद्दल मी तक्रारसुद्धा करत असे.

‘‘आई, कायम मी दादाच्या जुन्या वस्तू का वापरायच्या?’’

‘‘बाळा, तो तुझ्याहून दोनच वर्षांनी मोठा आहे. तुम्ही मुलं भराभर वाढता. एक वर्ष वापरले की कपडे मला घट्ट होतात, मग त्याला नवीन कपडे शिवून आधीचे कपडे मी स्वच्छ धुवून ठेवते. ते नव्यासारखेच असतात. मग वापरायला काय हरकत आहे. बूटांचंही तसंच आहे ना? पुस्तकं म्हणशील तर अभ्यासक्रम बदलला नाही तर तिच पुस्तकं तुला उपयोगी पडतात. बाईडिंग करून किंवा छान कव्हर घालून देते की नाही तुला? उगाच कशाला पैसे खर्च करायचे? शहाणा आहे ना माझ्या सोन्या? तुलासुद्धा घेऊ नवीन वस्तू.’’

असेच मधाचे बोट लावून आई मला नेहमी गप्प करीत असे. मला कधीच नवीन वस्तू वापरायला मिळाल्या नाहीत. शाळेच्या पहिल्या दिवशी इतरांचे नवे कोरे युनिफॉर्म, नवी कोरी पुस्तके, त्यांचा निराळा गंध यांनी मी हरखून जाई. आतल्या आत हिरमुसला होई. मला त्यांचा हेवा वाटे. या आनंदापासून मी कायमचा वंचित राहणार ही बोच सलत राही. जुनी पुस्तके वापरण्याचा मला इतका वीट आला होता की एस.एस.सी. झाल्यावर मी सायन्सला अॅडमिशन घेतलं. कारण त्यावर्षी दादा बारावी कॉमर्सला होता. अकरावी सायन्सला मला प्रथमच नवी पुस्तके वापरण्यास मिळाली. परंतु तिथेही माझे नशीब आडवे आले. केमिस्ट्री प्रॅक्टिकलला मला चक्कर येऊ लागली. अंगावर पुरळ उठू लागली. घरगुती औषधांचे उपाय थकल्यावर बाबांनी मला डॉक्टरकडे नेले.

‘‘बाबासाहेब, याला केमिकल्सची अॅलर्जी आहे. केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स जमणार नाहीत त्याला.’’

‘‘म्हणजे हा सायन्सला शिकू शकत नाही.’’

‘‘बरोबर आहे तुमचं.’’

आर्ट्सला स्कोप नाही या सबबीवर बाबांनी मला कॉमर्सला पाठवलं. पुनश्च येरे माझ्या मागल्या. दादाची अकरावीची पुस्तके, गाईड्स यांच्या सहाय्याने अभ्यास केला. लहान केल्याबद्दल निसर्गाला मी मनोमन दोष देऊ लागलो. दादा बी. कॉम झाल्यावर एम.बी.ए.ला गेला. मी सीएची कास धरली. मला वाटले, ‘‘चला, जुन्याची यात्रा पुस्तकापुरती तरी संपली. कपडे आहेतच पाचवीला पुजलेले. एम.बी.ए. झाल्यावर दादाला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच एका विख्यात मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. त्याच कंपनीने त्याला अमेरीकेला पाठवण्याचे ठरवले होते. त्याच्या जाण्याची मीसुद्धा उत्साहाने तयारी करत होतो. तो अमेरिकेला गेला. मी सीए यशस्वीरित्या पास झालो. मला नोकरीचे वेध लागले. इंटव्ह्यूसाठी बोलावणीसुद्धा येऊ लागली.’’

‘‘आई, मला आता इंटरव्ह्यूला जावं लागणार. नवीन कपडे शिवायचे म्हणतोय.’’

आईने मला दादाचे कपाट उघडून दाखवले. कपड्यांची चळतच होती. ‘‘हे बघ, तुझ्या दादाचे केवढे कपडे आहेत ते. बहुतेक तुझ्याचसाठी ठेवले असणार. एक दोनदाच वापरले असावेत. सूटसुद्धा आहेत. कोरे करकरीत असल्यासारखेच वाटतायत. तरीपण तुला पाहिजे असले तर लाँड्रीत देऊन आण.’’

आईच्या बोलण्याचा मतितार्थ मला कळला. मनातल्या मनात मी कपाळावर हात मारला. दादा अमेरिकेला गेला तरी जुन्याचे लेणे माझ्यासाठी ठेवून गेला होता. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मी यशस्वी झालो. मला नोकरी मिळाली. आईने आनंद व्यक्त केला. ‘‘बघितलंस? दादाच्या कपड्यांचा पायगुण? पहिल्या फटक्यात नोकरी मिळाली, आनंद होईल त्याला.’’

एकतर जुन्या वस्तू वापराव्या लागतात. त्याचे दु:ख आणि वर आईचे असे ताशेरे. म्हणजे माझ्या गुणवत्तेला मोलच नाही. आईचा दादाकडे असलेला कल माझ्या मनात सल धरू लागला होता. या जुन्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा जोरकस प्रयत्न मी पहिल्या पगारातच केला. चांगले चार कपड्याचे जोड शिवून घेतले.

अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यावर दादाला मुली सांगून येऊ लागल्या. थोडक्यात वधूपित्यांच्या उड्याच पडत होत्या. महिन्याभराने तो भारतात हजर झाला. त्याला लग्न करूनच जायचे होते. आम्ही निवडलेल्या चार मुलींमध्ये तसूभरही कमतरता नव्हती. तो स्वत: सर्वांना भेटला. त्यांच्याशी संवाद साधला आणि आपली वाग्दत्त वधू मुक्रर केली. शर्मिला देशमुख. बी. कॉम झालेली शर्मिला आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. श्री. देशमुखांचा स्पेअरपार्ट्सचा कारखाना होता. दिसायला अतिशय मोहक वागण्यात शालीन अशी शर्मिला कोणाच्याही मनात भरण्यासारखीच होती.

‘‘काय पक्या, तुला वहिनी पसंत आहे का?’’

‘‘म्हणजे काय दादा? शर्मिला टागोरलासुद्धा मागे टाकील एवढी सुंदर आहे. सालस आणि गुणीसुद्धा आहे. अशी वहिनी कुणाला आवडणार नाही? तुमचा जोडा तर छान शोभून दिसतोय.’’

लगेचच साखरपुडा उरकला. लग्न तीन आठवड्यांनी करण्याचे ठरले. त्यानंतर एका महिन्याने ती दोघं अमेरिकेला जाणार होती. हा प्लॅन दादानेच ठरवला होता. तो शर्मिलाच्या सहवासाचा एकही क्षण वाया घालवत नव्हता. दोघेही आपल्या प्रणयाच्या विश्वात मशगुल होते. सर्वत्र आनंदी आनंद भरून राहिला होता. खरेदीची रणधुमाळी दोन्ही घरी चालू झाली.

त्याने मला जबरदस्तीने खरेदीला नेले आणि आश्चर्य म्हणजे स्वत:सारखा सूटसुद्धा माझ्यासाठी खरेदी केला. लग्नाच्या दिवशी सकाळी घालण्यासाठी शेरवानीच्या सेटसुद्धा दोघांसाठी सारखाच खरेदी केला.

‘‘दादा, लग्न तुझं आहे. माझ्यासाठी एवढा साज कशासाठी?’’

‘‘तुसुद्धा लवकरच बोहोल्यावर चढशीलच की, त्यावेळी घाई नको.’’

‘‘साहेबांचा खिसा चांगलाच गरम दिसतोय.’’

‘‘पूर्ण तयारीनिशी आलोय. शर्मिलाला अमेरिकन डायमंडचा सेट तिकडूनच आणलाय. उद्या आईबाबांनासुद्धा खरेदीसाठी घेऊन जाणार आहे. माझे जुने कपडे वापरावे लागतात म्हणून कुरकुर करायचास ना? चल, तुला खुश करून टाकतो.’’

लग्नाच्या दिवशीचा धुमधडाका तर अवर्णनीयच होता. शर्मिला सजून मांडवात आली आणि सर्व नजरा तिच्यावरच खिळल्या. उर्वशीच अवनीतलावर उतरल्याचा भास होत होता. तिच्या पप्पांनी म्हणजे आबासाहेब देशमुखांनी कार्य दृष्ट लागेल इतक्या उत्कृष्टपणे साजरे केले. रोषणाई, मानपान, खाणेपिणे, कुठेही कमी पडू दिले नाही. सगळीकडे आनंदाची लाटच लहरत होती. शर्मिलावर तर सगळेच खुश होते. आत्याने आईला सल्ला दिला, ‘‘वहिनी, प्रसाद आणि प्रकाश अगदी रामलक्ष्मणच, प्रसादसाठी शर्मिला आणलीस तशी प्रकाशसाठी उर्मिला आण बरं का.’’

मी तर मनोमन ठरवून टाकले की आपल्या पत्नीचं नाव उर्मिलाच ठेवायचे. शर्मिलाला मॅचिंग. लग्नातील विधी चालू असताना दादा शर्मिलाच्या कानात कुजबुजत होता व ती सलज्ज प्रतिसाद देत होती. चेहऱ्यावरचे मधाळ स्मितहास्य तिच्या मोहकतेत भर घालीत होते. दोघेजण अगदी ‘मेड (मॅड) फॉर इच अदर’ वाटत होते. वरात आली आणि तिच्या आगमनाने घर अनोख्या सुगंधाने भरून गेले. सर्व सोपस्कार व्यवस्थित पार पाडल्यावर नवदाम्पत्य बंगळुरूला मधुचंद्रासाठी रवाना झालं. एका आठवड्याने ते परत येणार होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी दोघेही अमेरिकेला जाणार होते. दादाने सगळा कार्यक्रम आधीच ठरवला होता. शर्मिलाच्या आगमनाने आईला मुलगी मिळाल्याचा अपार आनंद झाला होता.

‘‘पोरीने, किती पकटन जीव लावला. आठ दिवसांसाठी गेली तर इतकं सुनं सुनं वाटतंय. कायमची गेली तर काय अवस्था होईल हो?’’

‘‘फार लाघवी पोर आहे. पण आपण तिला नाही ठेवून घेऊ शकत.’’

पोहोचल्याबरोबर लगेच दादाचा फोन आला. नंतरचे दोन दिवससुद्धा दोघेही फोनवर भरभरून बोलले. नंतर तो काळाकुट्ट दिवस उगवला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी घरीच होतो. दुपारी तीनच्या सुमाराला माझा मोबाइल वाजला.

‘‘हॅलो.’’

‘‘मी…मी…शर्मिला. प्रकाश, एक भयंकर घटना घडलीय.’’

ती रडत रडत तुटक बोलत होती. घाबरल्यासारखी वाटत होती.

माझाही थरकाप उडाला.

‘‘शर्मिला, शांत हो. रडू नकोस. काय झालंय ते सांग. दादा कसा आहे? तू कुठून बोलतेस?’’

‘‘प्रसाद नाही आहे.’’

ती जोरजोरात हुंदके देऊ लागली. तणाव आणि भीती यांनी माझा समतोल ढळला. मी अक्षरश: ओरडूनच विचारलं.

‘‘नाही आहे? म्हणजे नक्की झालंय तरी काय? प्लीज लवकर सांग गं. माझं टेन्शन वाढतंय. तू आधी रडणं थांबव.’’

काहीतरी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे आईबाबांच्या लक्षात आले. ते कावरेबावरे झाले.

‘‘अरे, प्रसाद अमेरिकेला निघून गेला.’’

‘‘काहीतरीच काय बोलतेस? तुला सोडून कसा गेला? तू जाऊ कसा दिलास? हे बघ. शांत हो, सगळं सविस्तर सांग. आपण मार्ग काढू. आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर? काळजी करू नकोस पण आम्हाला कळू दे काय झालंय ते. मी येईन तिकडे. सावर स्वत:ला आणि सांग सगळं.’’

तिला जरासा धीर आला.

‘‘प्रसाद कोडईकॅनालला जाण्याची तिकिटं काढण्यासाठी सकाळी दहा वाजता बाहेर पडला. दोन दिवस तिकडे राहून मुंबईला परतण्याचा प्रस्ताव त्यानेच मांडला. उशीर झाला तर जेवून घ्यायलाही सांगून गेला. दोन वाजेपर्यंत वाट पाहिली. मोबाईल स्विच ऑफ येतोय. आता जेवावं असा विचार करत असताच रूम बॉय एक लिफाफा घेऊन आला. मला वाटलं आत बिल असेल. उघडून पाहिलं तर ‘मी अमेरिकेला परत जात आहे,’ असं लिहून प्रसादने सही केली होती. माझ्यावर आभाळ कोसळलं. डोळ्यांसमोर काजवे चमकले. मी बेशुद्ध पडणार होते. कसंबसं बळ एकवटलं. नंतर माझ्या लक्षात आलं की माझे दागिनेसुद्धा नाहीसे झाले आहेत. रात्री कपाटात ठेवले होते. माझ्याकडे पर्समध्ये थोडेसे पैसे आहेत. अगदी असहाय्य केलीय मला. काय करू मी आता? आबांनासुद्धा काही कळवलं नाही.’’

ती परत रडू लागली. मीसुद्धा परुता हादरून गेलो होतो. स्वत:ला सावरून तिला धीर देणे आवश्यक होते.

‘‘आबासाहेबांना कळवलं नाहीस ते योग्य केलंस. शर्मिला, तू धीर धर. रडू नकोस, तू एकटी नाही आहेस, आबासाहेबांना कसं कळवायचं ते मी बघतो. प्रसंग फारच कठीण आहे. आपण त्यातूनही मार्ग काढू.’’

‘‘तू हॉटेलमध्येच थांब. उपाशी राहू नकोस. मी सर्वांशी बोलतो आणि तिकडे येतो. बहुतेक रात्रीपर्यंत येऊ शकेन. नाहीतर उद्या सकाळी नक्कीच. काळजी घे हां. ठेवतो फोन.’’

आईबाबांना सगळा वृत्तांत सांगितल्यावर बाबा तर शरमेने काळे ठिक्कर पडले. आई अक्षरश: धाय मोकलून रडू लागली.

‘कुसंतानपेक्षा नि:संतान बरं’ असं म्हणायची वेळ आणली नालायकाने. असे म्हणतच ती बेशुद्ध झाली. तिला आम्ही दोघांनी कसेबसे सावरले. मी त्यांना दागिन्यांविषयी काहीच सांगितले नव्हते. मलाच लाजिरवाणे वाटत होते.

‘‘आईबाबा, आबासाहेबांना काहीच माहीत नाही. आपणच त्यांना कळवलं पाहिजे. मी समक्षच जाऊन सांगतो.’’

‘‘आम्ही येऊ का?’’

‘‘नको बाबा. आईची येण्याची परिस्थिती नाहीए आणि एकटं राहण्याचीसुद्धा. तेव्हा मी एकटाच जातो. अवघड वाटतंय. पण हा दुर्धर प्रसंग मलाच निभावून न्यावा लागणार असं दिसतंय.’’

मी दबकतच त्यांच्या घरात प्रवेश केला.

‘‘या प्रकाशराव, शमू आणि प्रसाद केव्हा येतायत?’’

‘‘नाही…नाही…मी…मी दुसऱ्याच कामासाठी आलो होतो.’’

‘‘बोला ना काही प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘हो…हो…कठीण प्रॉब्लेम. दादा अमेरिकेला निघून गेला.’’

‘‘काय? काल संध्याकाळीच शमूचा फोन आला होता. काही बोलली नाही आणि असं अचानक का ठरवलं.’’

‘‘नाही. तो एकटाच गेला.’’

‘‘आणि आमची शमू?’’

मी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी जमदाग्निचा अवतार धारण केला. ते रागाने थरथरत होते व मी भीतिने. त्यांनासुद्धा दागिन्यांविषयी काही सांगितले नाही.

‘‘हरामखोर साला. माझ्या एकुलत्या एका पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी केली. समोर असता तर गोळी घालून ठारच केला असता. पण मी त्याला सोडणार नाही.’’

त्यांना सावरण्यासाठी काकी पुढे आल्या.

‘‘तुम्ही जरा शांत व्हा. आधी पाणी प्या बघू. प्रसंग आला आहे खरा. त्याला तोंड तर दिलं पाहीजे ना? प्रथम आपण शमूला सावरलं पाहीजे. काय प्रसंग गुदरला आहे माझ्या बाळावर. कुठे आहे ती?’’

‘‘ती बंगळुरूलाच आहे हॉटेलमध्ये. मी तिला आणायला जातो आहे. तसं मी तिला फोनवर सांगितलं आहे.’’

‘‘नको, आम्ही दोघं जातो. तुम्ही आईबाबांजवळ थांबा. आपण शमूशी बोलू या का?’’

मी शर्मिलाच्या मोबाइलवर फोन लावला.

‘‘मी प्रकाश बोलतोय. आबासाहेबांच्या घरून. बरी आहेस ना तू? थांब बोल त्यांच्याशी.’’

‘‘शमू बेटा, रडू नकोस. धीर धर. त्याच्यावर धाय मोकलून रडायची वेळ आणतो की नाही बघ. आम्ही दोघं तुला आणायला तिकडे येतोय. शेवटच्या फ्लाईटने निघतो. काळजी घे.’’

आता क्रोधाची जागा करूणेने घेतली होती. त्यांचे डोळे पाझारू लागले. काकी व्याकूळ होऊन त्यांना वरवर धीर देत होत्या. आई तर अंथरूणालाच खिळळी होती. डोळ्यांतील पाण्याला खिळ नव्हता. इतक्या जणांना दु:खाच्या खाईत लोटणाऱ्या उलट्या काळजाच्या माझ्या भावाची मला मनस्वी किळस आली. शर्मिलाला घेऊन आल्याचे आबासाहेबांनी आम्हाला कळवले आणि ती तिघेही आमच्या घरी आली.

‘‘शर्मिला, काय झालं हे बाळा?’’ असे ओरडून आई पुन्हा बेशुद्ध झाली. बाबा केविलवाणे होऊन हात जोडू लागले.

‘‘आबासाहेब, आम्ही तुमचे अनंत अपराधी आहोत. असला अवलक्षणी कार्टा जन्माला घातल्याची शरम वाटते मला.’’

आबासाहेब एव्हाना शांत झाले होते. काकी आणि शर्मिला आईची समजूत घालत होत्या.

‘‘बाबासाहेब आपल्या सर्वांचंच हे दुर्भाग्य आहे. पण तुम्ही नका अपराधी वाटून घेऊ. मी त्याला पातळातून धुंडून काढीन आणि शिक्षा देईन. प्रकाश, त्याला अमेरिकेत कॉन्टॅक्ट करण्याचा काही मार्ग आहे का?’’

‘‘ऑफिसचा नाही, पण तो राहत असलेल्या अपार्टमेंटचा नंबर आहे माझ्याकडे.’’

‘‘जरा बघतोस प्रयत्न करून?’’

फोन लावला तर दादाने ते अपार्टमेंट तीन महिन्यांपूर्वीच सोडल्याचे कळले.

‘‘म्हणजे हरामखोराने पूर्वीपासूनच हा कट रचला होता. यात आमच्या मुलीचा मात्र बळी गेला. नवीन बिझनेस चालू करण्यासाठी माझ्याकडून पाच लाख रूपये घेऊन गेला.’’

‘‘माझ्याकडे याच कारणास्तव पैसे मागितले. पी.एफमधले दोन लाख रुपये होते, ते मी दिले त्याला.’’

मी गौफ्यस्फोट केला.

‘‘शर्मिलाचे बंगळुरूला नेलेले दागिनेसुद्धा नाहीसे झालेत.’’ आबासाहेबांना राग अनावर झाला.

‘‘नीच, अमानुष. तुमची दोन मुलं म्हणजे दोन विरूद्ध ध्रुव आहेत. आता मीसुद्धा हकिकत पेपरात प्रसिद्ध करणार. अमेरिकेत माझे काही हितसंबंधी आहेत. त्यांनाही कळवणार. त्यांची चांगली नाचक्की करतो सगळीकडे. आम्हाला फसवतो काय?’’

आता समाजात छी थू होणार या कल्पनेने की काय बाबा धास्तावल्यासारखे झाले.

‘‘आबासाहेब, आमच्या मुलाच्या हातून अक्षम्य गुन्हा झाला आहे. पण कृपा करून आपण सबुरीनं घ्या. या परिस्थितीतही मागचा पुढचा विचार करायला हवा. मेंदूला अगदी झिणक्षिण्या आल्यात. तुम्ही पाहताच. हिची परिस्थिती किती नाजूक झालीए ते. शिवाय शर्मिलाच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करायला हवा ना? एक आठवड्याचा अवधी द्या आम्हाला. काही तोडगा निघतो का बघतो. नाहीतरी अवहेलना आणि मानहानी सहन करावी लागतेच आहे. ती जगजाहीर होईल.’’

आबासाहेबांनी एक आठवडा थांबण्याचे कबूल करून खरोखरच कृपा केली होती.

‘‘कार्ट्याने तोंडाला काळं फासलं हो. पोरीच्या आयुष्याची होळी केली.’’

‘‘बरोबर आहे तुझं. आपण तिचे शतश: अपराधी आहोत. कधी न भरून येणारी जखम आहे ही. आबासाहेब भले माणूस आहेत म्हणून एक आठवडा तरी थांबायला तयार झाले. आपणच सावरून, समतोल विचार करून तिच्या कल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे. तेव्हा तू जरा धीराने घे आणि काय सुचतंय ते बघ.’’

आईला बाबांचे म्हणणे पटले. तिचा जीव शर्मिलासाठी तीळतीळ तुटत होता. तिने विचाराला चालना दिली असावी. कारण ती बाबांच्या बरोबर चर्चा करू लागली. तपशील कळला नाही. तरी दुसरा कोणता मुद्दा यावेळी विचारांत घेणे शक्यच नव्हते. हे मी जाणून होतो. आई पूर्ववत झाली आणि मला जरा हायसे वाटले, शर्मिलासुद्धा येऊन आईला भेटून गेली. आश्चर्य म्हणजे दोघींनीही मनावर कौतुकास्पद संयम ठेवला होता. एका संध्याकाळी मी ऑफिसमधून आलो तर आईबाबा नुकतेच देशमुखांकडे जाऊन आल्याचे कळले.

‘‘बाबा, आबासाहेबांनी बोलावलं होतं का?’’

‘‘नाही रे, सहज भेटून आलो. ही फार दिवस त्या दोघांना भेटली नव्हती आणि शर्मिलालासुद्धा पहाविशी वाटत होती.’’

‘‘ठिक आहे ना सर्व?’’

‘‘आहे ते ठिकच म्हणायचं. पण पुढचा विचार करणं आवश्यक आहे,’’ आईने त्यांना थांबवलं.

‘‘प्रकाश, आताच आलास ना? हातपाय धुवून घे. चहा टाकते. खाऊन घे.’’ आईचे अचानक थांबवणे मला खटकले. चहापाणी झाले. आम्ही तिथे बोलत बसलो. मला जाणवत होते की आईला काहीतरी सांगायचे आहे. पण तिला अवघड वाटते आहे. फार अस्वस्थ वाटत होती.

‘‘आई, काय झालं? काही सांगायचं आहे का? गोंधळलीस का?’’

‘‘अगं, सांग आता. का उगाच टेन्शन वाढवतेस?’’

‘‘प्रकाश, म्हणजे बघ…म्हणजे मला…आम्हाला वाटतंय म्हणून मी सुचवते. पण तू विचार कर हं!’’

‘‘कसला विचार करू आणि सुचवतेस काय? माझ्याशी बोलताना अशी चाचरेतस कशाला?’’

शेवटी धीर करून बाबांनीच गौप्यस्फोट केला.

‘‘प्रकाश, आम्हाला वाटतं, तू शर्मिलाचा पत्नी म्हणून स्विकार करावास,’’ सर्वांगातून विजेचा प्रवाह जात असल्याचा भास मला झाला आणि मी जवळजवळ किंचाळलोच.

‘‘कसं शक्य आहे, बहिनीप्रमाणे असणारी वहिनी आणि पत्नी? छे, मी कल्पनाच करू शकत नाही. तुम्ही असं सुचवता तरी कसं?’’

‘‘प्रकाश बाळा, हे सुचवताना अगदी जिवावर येतंय. माहिती आहे की तुझ्या स्वत:च्या वैवाहिक जीवनाबद्दल काही कल्पना असतील. उच्चशिक्षित आणि पगारदार असल्यामुळे तुला सर्वगुणसंपन्न वधू मिळेलही. परंतु आपण शर्मिलेचा विचार करू या. काहीही अपराध नसताना तिच्या आयुष्याची परवड होणार आणि आपल्याला ती उघड्या डोळ्यांनी पहावी लागणार, अर्थाअर्थी आपणच त्याला कारणीभूत आहोत ना? असलं अवलक्षणी कार्ट जन्माला येणं हे दुर्दैवच.’’

परत ती हुंदके देऊन रडू लागली.

‘‘आई, मला विचार करायला वेळ हवा. हेच बोलायला तम्ही देशमुखांकडे गेला होता वाटतं? काय म्हणाले ते?’’

‘‘आम्ही बोललो त्यांना. लगेच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांनाही विचार करायला वेळ लागेल ना? करतील ते फोन. तुझा विचार घ्यायला सांगितलाय त्यांनी.’’

माझ्या पायाखालची जमिनच सरकली. वज्राघात होत असल्याची जाणीव झाली. मेंदू अगदी सुन्न झाला होता.

‘‘आई, मी जरा मोकळ्या हववेर फिरून येतो.’’

‘‘अरे, यावेळी कशाला जातोस?’’

लांबवरच्या बागेत फिरून आल्यावर किंचित हलके वाटले. मी येईपर्यंत आईबाबा चिंतातुर होते. जेवणावर वासना नव्हतीच. चार शिते चिवडल्यासारखे केले व बिछान्यावर पडलो. विचाराला चालना देणे आवश्यक होते. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या वैवाहिक आयुष्याला सुरूवात होण्याआधीच चूड लागू पाहत होती. दादाचे जुने कपडे आणि पुस्तके वापरणारा मी आता त्याने त्यागलेली पत्नी…छे छे, शक्यच नाही ते. फेटाळूनच लावला पाहिजे हा प्रस्ताव. मेंदूला मुंग्या डसल्यासारखे वाटू लागले. परंतु मन:चक्षुसमोर सतत डोळे गाळून अंथरूणाला खिळलेली आई, नामुष्कीच्या शरमेने अगतिक झालेले बाबा, जमदाग्निचा अवतार धारण करणारे आबासाहेब, त्यांना सावरण्याचा प्रयत्न करणारी ती दु:खी माऊली काकी आणि आपल्या आयुष्याच्या वैराण वाळवंटातील वाळूप्रमाणे शुष्क झालेली शर्मिला दिसू लागली. दहा डोळे आशाळभूत नजरेने माझा मागोवा घेत असल्याचा भास झाला. आपण उष्ट्या ताटाचा धनी होणार या कल्पनेने अंत:करण पिळवटून निघाले.

दादाचे ड्रॉईंग छान होते. शाळेत असताना तो उत्तम चित्रे काढीत असे, अगदी हुबेहुब. चित्र पुरे झाले की ते मित्रांना दाखवायला तो घेऊन जाई, सगळे सामान तसेच ठेवून. घर नीटनेटके ठेवण्यावर बाबांचा कटाक्ष. आई मला विनवणी करी. ‘‘प्रकाश, राजा आवरून ठेव रे ते सामान. हे आले आणि पसारा बघितला तर उगाच चिडचिड करतील. बेसनाचे लाडू केलेत. देते तुला लगेच.’’

‘‘आई, त्याला सामान जागेवर ठेवून जायला काय होतं? बेसनाच्या लाडवाची लालूच दाखवून तू मला काम करायला लावतेस. त्याने बिघडवायचं आणि मी निस्तरायचं असा अलिखित नियम केलायस का तू?’’

आईचा तो अलिखित नियम माझा पाठपुरावा करीत होता. जीवनाच्या या टप्प्यावर त्याने केलेली अक्षम्य चूक मलाच निस्तरावी लागणार होती. निव्वळ तो माझा भाऊ होता म्हणून अभावितपणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले.

‘‘बालपण नको रे बाबा.’’

कर्माचं फळ

कथा * गिरीजा पाठक

आयुष्यात कधी कधी एखाद्या वळणावर माणूस अशा अवस्थेत असतो की नेमकं काय करावं, कुठं जावं हेच त्याला समजेनासं होतं. सुनयना आज अगदी अशाच परिस्थितीत सापडली होती. काही क्षणांत तिचं आयुष्य पूर्णपणे ढवळून निघालं होतं.

आज सकाळी सुशांत त्याच्या खोलीतून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. सहजच काही वाक्य तिच्या कानांवर पडली. ‘‘ओ. के. डियर, बरोबर पाच वाजता मी पोहोचतोय, हो, हो. नक्षत्र हॉटेलमध्ये…आता या क्षणी मी फक्त तुझाच विचार करतोय अन् प्रत्यक्ष भेटेपर्यंत माझ्या डोक्यात तूच असणार आहेस.’’ असं म्हणून त्यानं फोनवरच तिचा मुका घेतला. हे बघून सुनयनाला धक्काच बसला.

सुनयना मध्यमवर्गीय कुटुंबातली, शिक्षण अर्धवट सुटलेलं…रूप मात्र देखणं, त्यामुळेच गर्भश्रीमंत सुशांतशी लग्न झाल्यामुळे मिळालेली समृद्धी उपभोगताना ती सुशांतला दबून असायची. बंगला, शोफर ड्रिव्हन तिची स्वत:ची कार, स्वयंपाकी, घरगडी, मोलकरीण, माळी असं सगळं वैभव दिल्याबद्दल ती त्याची कृतज्ञ होती. पूर्णपणे समर्पित होती. दागदागिने, कपडालत्ता, हौसमौज कशातच उणीव नव्हती, पण आज हे काय भलंतच? तिनं ठरवलं प्रकरणाचा मागोवा घ्यायचा. तीही पाच वाजण्याच्या प्रतिक्षेत होती. नक्षत्र हॉटेलात जाऊन बघणार होती. खात्री करून घेणार होती.

पाच वाजण्याआधीच तिनं तिची गाडी नक्षत्र हॉटेलपासून काही अंतरावर पार्क केली अन् ती हॉटेलच्या लाउंजमध्ये येऊन बसली. तिनं आज डोक्यावरून पदर घेतला होता. काळा गॉगलही लावला होता. हातात वाचायला पुस्तक होतं. त्यामुळे चेहरा झाकला जात होता.

बरोबर पाच वाजता ऐटबाज कपडे घातलेला सुशांत गाडीतून उतरून रिसेप्शन समोर आला. त्याचवेळी एक मुलगीही तिथं आली. दोघांची गळाभेट झाली अन् हातात हात घालून दोघं लिफ्टकडे निघाली. नक्कीच वरच्या मजल्यावर रूम बुक केलेली असणार.

सुनयनाचे डोळे भरून आले. घशाला कोरड पडली. तिला वाटलं आता इथंच आपण जोरजोरात रडू लागणार. स्वत:ला कसंबसं सावरलं तिनं. काही वेळ स्तब्ध बसून राहिली. जरा शांत झाल्यावर उठली, गाडीत येऊन बसली आणि घरी येऊन पलंगावर कोसळली. आता ती मुक्तपणे रडू शकत होती. बराच वेळ रडल्यावर तिचं मन थोडं शांत झालं. ती विचार करत होती, तिच्या प्रेमात, तिच्या सेवेत, तिच्या समर्पणांत कुठं उणीव राहिली होती म्हणून सुशांतला अशी दुसऱ्या स्त्रीची ओढ वाटली? ती जरी फार शिकलेली नाही, तरी सुसंस्कृत, चांगल्या वळणाची आहे. सुंदर आहे, निरोगी आहे…सुशांतची काळजी घेते. त्याला कधीच तिनं तक्रार करण्याची संधी दिली नाही…तरीही?

तिनं तिच्या जिवलग मैत्रिणीला फोन लावला. सुप्रियाला सुनयनाच्या आवाजावरूनच काही तरी बिनसलं आहे हे लक्षात आलं. ‘‘काय झालं सुनयना? तू बरी आहेस ना?’’

सुनयनला पुन्हा रडू फुटलं. कशीबशी तिनं सर्व हकिगत सुप्रियाला सांगितली. तिला समजंवत म्हटलं, ‘‘तू शांत हो अन् धीर सोडू नकोस. अगं, आयुष्यात असे प्रसंग येतातच…दुसऱ्यावरचा काय, स्वत:वरचाही विश्वास उडेल असं कित्येकदा घडतं. अगं, मलाही खूपदा भीती वाटते, मी अजून लग्न केलं नाहीए. न जाणो, कुणाच्या प्रेमात पडले अन् त्यानं विश्वासघात केला तर? पण म्हणून रडत बसायचं नाही. उलट आपलं मन इतरत्र रमवायचं.’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय गं! पण मी तर माझं सगळं आयुष्यच सुशांतला वाहिलेलं आहे ना?’’

‘‘पण असं फक्त तुझ्याच बाबतीत घडतंय असं नाही…सुनयना, तुला नेहा आठवतेय?’’

‘‘नेहा? तिची आई आपल्या शाळेत क्लर्क म्हणून काम करायची, ती?’’

‘‘हो गं! तीच, तिला मी अधूनमधून माझ्या आईच्या मदतीला बोलावून घेत असते. सध्या ती कुठंतरी नोकरीही करते आहे. आमच्या घराजवळच राहते. तिचीही एक कहाणीच आहे. लव्ह मॅरेज केलं होतं…नवरा बदफैली निघाला.’’

‘‘अगंबाई…तीही माझ्यासारखीच रडते ना?’’

‘‘छे! ती बरी पक्की आहे. नवऱ्याला तिनं चांगलंच खडसावलं. यापुढे नीट राहिला नाही तर ती घटस्फोट देणार आहे त्याला. तिनं पोलिसातही तक्रार दिलीय.’’

‘‘चांगलं केलं तिनं…पण मी असं नाही करू शकणार…या सुखासीन आयुष्याची सवय लागलीय…शिक्षण बेताचं…’’ निराश सुरात सुनयनानं म्हटलं.

‘‘अगं, होतं असं कधीकधी, काय करावं याचा निर्णय असा पटकन् घेता येत नाही. विशेशत: ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, तोच असा विश्वासघात करतो, आपल्या प्रेमाची किंमत मातीमोल ठरवतो, तेव्हा फारच वाईट वाटतं…तू आत्ता फार विचार करू नकोस. शांत मनानं झोपायचा प्रयत्न कर…नंतर यावर विचार करता येईल.’’

‘‘ही गोष्ट इतकी छोटी नाहीए प्रिया, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे…’’

‘‘कळतंय मला. तरीही आता फोन बंद कर.’’ प्रियानं एका झटक्यात फोन बंद करून टाकला.

सुनयनानंही हातातला रिसीव्हर खाली ठेवला. ती पलंगावर आडवी झाली. मन मात्र परत परत त्याच प्रसंगावर केंद्रित होत होतं. सुशांतचं फोनवरून किस करणं, त्या दोघांची गळाभेट, हातात हात घालून लिफ्टकडे जाणं.

अन् हे काही प्रथमच घडलंय असंही नाही. यापूर्वीही रेवाबरोबर त्याचे घनिष्ट संबंध होते. पण तेव्हा सुशांतनं तिची क्षमा मागितली होती. रेवा त्याची जुनी मैत्रीण आहे. तिला दुखवायचं नाही म्हणून मैत्री ठेवतो वगैरे म्हणाला होता.

सुनयानानं तेव्हा फार त्रागाही केला नव्हता. कारण ती सुशांतवर मनापासून प्रेम करत होती. त्यांनही तिला त्याच्या प्रेमाची ग्वाही दिली होती. शिवाय सुशांतची श्रीमंती व शिक्षणामुळे तिला स्वत:ला फारच न्यूनगंड जाणवायचा. त्यानं काही कारणामुळे तिला घरातून हाकूलनच दिलं तर? या प्रश्नानं तिची झोप उडायची. त्याच्यामुळेच आपण इतकं सुखासीन आयुष्य जगतोय हेही तिला मान्य होतं…तरीही आज तिला सुशांतचा राग आला. रेवाशी त्याची मैत्री होती, कदाचित प्रेमही असेल पण आज जे काही होतं, ती फक्त वासना होती. शारीरिक सुखाची ओढ होती.

रात्री उशीरा घरी परतलेला सुशांत जणू काहीच घडलं नाहीए असं वागत होता. सुनयननाही शांतच होती. नियतीचा खेळ मुकाट्यानं बघण्याखेरीज तिच्या हातात याक्षणी काहीच नव्हतं. मागच्या वर्षीच तिच्या लक्षात आलं की सुशांत अधूनमधून ड्रग्ज घेतो. प्रचंड आटापिटा करून तिनं त्यातून त्याला बाहेर काढलं होतं.

दोन महिने असेच गेले. सुनयना शांतपणे सुंशातवर नजर ठेवून होती. एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं की त्याचे दोनतीन स्त्रियांबरोबर संबंध आहेत. एकदोनदा तिनं त्याला म्हणतात तसं ‘रंगे हाथों’ पकडलं पण तो निर्लज्जपणे हसला होता. इतका बेडरकारपणा सुशांत करू शकतो हे बघून तिलाच लाज वाटली होती.

मनातल्या मनात ती झुरत होती. एकदा तिनं आईला फोन करून सांगायचा प्रयत्न केला. पण आईनं ऐकूनच घेतलं नाही. श्रीमंत जावयाबद्दल काहीही ऐकून घ्यायला ती तयार नव्हती. उलट, ‘‘तो तुला कमी करत नाहीए ना? मग राहा तिथंच सुखानं…इतक्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडू नकोस.’’ आईनं तिलाच दटावलं होतं.

काय करावं? घर सोडायचं? घटस्फोट घ्यायचा? पण मग जगायचं कसं? गरीब माहेरी तिला कुणी आधार, आश्रय देणार नव्हतं. शिक्षण बेताचं…नोकरी तरी कशी मिळणार? सुखासीन आयुष्याची सवय झालेली…कष्ट करणं जमेल? दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल, कशी असेल? दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल कशी असेल याची खात्री नाही…त्यापेक्षा जे चाललंय ते चालू दे. निदान समाजात इभ्रत, अब्रू, मानसन्मान आहे. सुनयना तासन्तास विचार करत होती…निश्यच होत नव्हता.

एक दिवस सकाळीच प्रियाचा फोन आला. ‘‘अगं, एक बातमी आहे. आपली नेहा…नवऱ्याला सोडून आली आहे. तिनं त्याला घटस्फोटाची नोटिस दिलीय.’’

‘‘काय सांगतेस?’’ सुनयनानं दचकून विचारलं, ‘‘इतका मोठा निर्णय तिनं तडकाफडकी घेतलादेखील?’’

‘‘हो ना, चांगला निर्णय घेतला. त्याला धडा शिकवला तिनं. मला तर वाटतं तूही तसंच करायला हवंय.’’

सुनयनानं फोन ठेवला. दिवसभर, रात्रभर ती तळमळत होती…काय करावं हा विचार डोकं पोखरत होता. शेवटी सकाळी तिचा निर्णय झाला. ‘‘ठीक आहे. मीही आता नेहासारखा घर सोडायचाच निर्णय घेते. सुशांतला धडा शिकवते. माझ्या प्रेमाची समर्पणाची किंमत नाहीए त्याला. स्वत:च्या श्रीमंतीचा माज आहे…तुझी श्रीमंती तुला लखलाभ…’’ पटकन् तिनं आवरलं अन् नीटनेटकी तयार होऊन पर्स घेऊन ती घराबाहेर पडली. सुशांतला काही सांगावं, त्याचा निरोप घ्यावा या भरीला पडलीच नाही. त्यानं पुन्हा क्षमा मागितली तर तिचा निश्चय डळमळेल म्हणून न सांगताच बाहेर पडली. सुशांतनं केलेला विश्वासघातही नको अन् त्याची बायको म्हणून सुरक्षित, सुखनैव आयुष्यही नको…काय व्हायचं ते होईल.

नवऱ्याचं घर सोडलं, माहेरी जाणं शक्य नाही…काय करायचं? बराच वेळ मेट्रो रेल्वेच्या स्टोजवर ती सुन्न, बधीर होऊन बसली होती. तेवढ्यात सुप्रियाचा फोन आला. ‘‘कुठं आहेस तू? घरचा फोन लावला तर सुशांतनं उचलला. तू घरी नाहीएस म्हणाला. तुझा मोबाईलही तू उचलत नव्हतीस. बरी आहेस ना?’’

‘‘मी…मी घर सोडलंय…’’ दाटलेल्या कंठानं ती एवढंच बोलू शकली.

सुप्रियाही हादरलीच… ‘‘आता कुठं जाणार आहेस? मुळात तू आहेस कुठे?’’

‘‘आहे. मेट्रो रेल्वे स्थानकावर…कुठं जायचं तेच कळत नाहीए.’’

‘‘ताबडतोब माझ्या घरी ये. मी आज रजा टाकतेय, निवांतपणे तुझ्या आयुष्याची दिशा ठरवूयात. लगेच निघ. मी वाट बघतेय.’’ सुप्रियानं म्हटलं. खरोखर ती धाडसी अन् विचारी होती. ती ही एकटीच होती. दोघी एकत्र राहिल्यावर एकमेकींचा आधार होईल.

सुनयनानं आल्याबरोबर प्रियाला मिठी मारली अन् भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रियानं तिला मनसोक्त रडू दिलं. मग पाण्याचा ग्लास तिच्यासमोर ठेवून तिनं चहा केला. चहा घेताघेता म्हणाली, ‘‘जे काही रडणं आहे ते फक्त आज. यापुढे फक्त लढायचं आहे. स्वत:ला सिद्ध करायचं तू. मनांतली सगळी भीती काढून टाक. मी तुझ्या पाठीशी आहे.’’

सुनयनाला सावरायला थोडा वेळ हवा होता. प्रियानं तिला सुचवलं की ती शिवण काम छान करायची. थोड्या सरावानं ती पुन्हा ते काम करू शकते. घरात बसून काम होईल…पैसा हातात येऊ लागेल. सध्या शिवणावर बायका व पुरूष टेलरही खूप पैसा मिळवत आहेत.

सुनयना तयार झाली. शिवणाचं मशीन सुप्रियानं विकत आणलं. कापड आणलं. त्यातून काही पोषाख, ब्लाउज वगैरे तयार झाले. सोसायटीतच ग्राहक भेटले. कामं मिळू लागली.

काही दिवस गेले अन् सुनयनाला जाणवलं की ती आई होणार आहे. डॉक्टरांकडे तपासून घेतल्यावर तर पक्कीच खात्री झाली. सुशांतपासून दूर झाली तरी सुशांतशी संबंध संपलेच नव्हते…काय करावं? ती पुन्हा घाबरी झाली. सुप्रियानं पुन्हा धीर दिला. ‘‘हे बाळ आपण वाढवू…तू काळजी करू नकोस,’’ असं समजावलं. सुनयनाबद्दल ती खूप काळजी घेत होती. दिवस पूर्ण भरले अन् सुनयना एका गोंडस मुलीची आई झाली.

सुप्रियाला नोकरीत भराभर बढत्या मिळत गेल्या. तिनं शहराच्या लांबच्या भागात चांगला फ्लॅट घेतला. सुनयनाचा आता जुन्या जगाशी, सुशांतशी काहीच संबंध नव्हता. मधल्या काळात तिची आईही वारली. आता तर माहेरचाही संबंध संपला. पण ती सुप्रिया, आपली लेक अन् स्वत:चं काम यात अगदी रमली होती. आनंदात होती. तिचं कामही जोरात सुरू होतं. मुलीला उत्तम शाळेत अॅडमिशन मिळाली होती. इकडे सुशांतची मात्र परिस्थिती अगदीच वाईट होती. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक फटका बसला होता. पैशासाठीच त्याला जवळ करणाऱ्या त्या सर्व मुली त्याला सोडून गेल्या होत्या. त्याच्या वागण्यामुळे पुरूष मित्रही दुरावले होते. फारच एकटा पडला होता. तब्येतीच्या कुरबुरीही सुरू झाल्या होत्या. सुनयनाची फार आठवण यायची. तिचं प्रेम, साधं वागणं, समर्पण आठवून तो हळवा व्हायचा…तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. कुणाला विचारणार? पोलिसात तक्रार देणं त्याच्या इभ्रतीला शोभलं नसतं.

एक दिवस असाच निराश मन:स्थितीत तो टीव्हीसमोर बसून चॅनेल बदलत होता. एका चॅनलनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. ‘सुपर चाइल्ड रिएलिटी शो’ नामक कार्यक्रम सुरू होता. प्रेक्षकांमध्ये समोरच सुनयना दिसली त्याला. तो लक्षपूर्वक बघू लागला.

स्टेजवर एक लहानशी मुलगी अतिशय सुरेख गाणं म्हणत तेवढंच सुंदर नृत्यही करत होती. सुशांत भान हरपून बघत होता. तिचं नृत्य संपलं तेव्हा सर्व परीक्षक व प्रेक्षक उठून उभे राहून टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करू लागले.

सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. परीक्षकांनी त्या कलाकार मुलीला तिच्या पालकांबद्दल विचारलं, तेव्हा कॅमेरा सुनयनावर स्थिरावला. चकित होऊन सुशांत बघत होता…म्हणजे ही मुलगी सुनयनाची आहे? म्हणजे त्याचीच ना? की तिनं दुसरं लग्न केलंय?

मुलीनं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुनयना व सुप्रियाला हातानं धरून स्टेजवर आणलं…‘‘मला बाबा नाहीएत…पण दोन ‘आई’ आहेत. याच दोघी माझे आईबाबा आहेत. मी जी काही आहे ती यांच्या कष्टामुळे, संस्कारामुळे आहे.’’

‘सुपर चाइल्ड’, ‘सिंगल मदर’ सगळेच अभिनंदन करत होते. प्रेक्षकांच्या टाळ्या थांबतच नव्हत्या. सुशांतला कळत नव्हतं या मुलीचे बाबा कोण? तो की कुणी दुसरा? सुनयनाला कुठं अन् कसं भेटावं? मुलीला प्रेमानं मिठीत घ्यावं असं वाटत होतं. पण तो फक्त रडत होता.

सुनयना लेकीला मिठीत घेऊन रडत होती. आनंद, अभिमान, कष्टाचं सार्थक, मुलीबद्दलची अपार माया तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती. प्रियानं तिला आधार दिला होता.

सुशांत फक्त अश्रूभरल्या डोळ्यांनी ते दृश्य बघत होता. एकटाच!! असहाय!!

भरला पापाचा घडा

कथा * संजीव जामकर

हॅलो पप्पा, माझं कॅम्पस सिलेक्शन झालं आहे.’’ ऐश्वर्या जवळजवळ ओरडतच फोनवर बोलत होती. तिचा आनंद ओसंडून वाहत होता.

‘‘अरे व्वा! अभिनंदन पोरी…कोणत्या कंपनीत झालंय?’’ पप्पांचाही आवाज आनंदानं ओथंबला होता.

‘‘रिव्होल्यूशन टेक्नोलॉजीमध्ये. खूप मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. बऱ्याच देशात शाखा आहेत या कंपनीच्या.’’ ऐश्वर्या आनंदानं सांगत होती. ‘‘कॉलेजमध्ये सर्वात जास्त पॅकेज मलाच मिळालंय. बहुतेकांना तीन ते साडे तीन लाखांचं पॅकेज मिळालं आहे, मला मात्र साडे चार लाखांचं पॅकेज दिलंय…पण?’’

‘‘पण…पण काय?’’

‘‘पप्पा, कंपनी दोन वर्षांचा बॉन्ड करून घेते आहे…मला समजत नाहीए…मी हो म्हणू की नको?’’

‘‘अगं, इतर कंपन्याही एक वर्षाचा बॉन्ड तर मागवतातच ना? चांगली सुरूवात होतेय तर दोन वर्षांचा बॉन्ड भरायला काहीच हरकत नाहीए. कारण दोन वर्षांनंतर कंपनी बदलावीशी वाटली तर तुला यापेक्षा वरचा जॉब मिळेल ना? उलट तुझ्या बरोबरीच्या मुलांना त्यावेळी जेमतेम तेवढा पगार मिळेल ज्यावर तू आज सुरूवात करते आहेस.’’ पप्पांनी समजावलं.

‘‘थँक्यू पप्पा, तुम्ही माझी काळजी दूर केलीत.’’

ऐश्वर्या लखनौच्या इंजिनियअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी होती. प्रत्येक सेमिस्टरला टॉप करायची. सगळ्यांनाच तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक होतं. तिलाच सर्वात जास्त पॅकेज मिळणार हेही सर्व जाणून होते.

दोन दिवसांनी घरी पोहोचली, तेव्हा आईनं औक्षण करून तिचं स्वागत केलं. बाबांनी तिला जवळ घेऊन आशिर्वाद दिला. ‘‘तुला पोस्टिंग कुठं मिळेल?’’ आईनं विचारलं.

‘‘बंगळुरूला.’’

घरात एखाद्या सणा उत्सवाचं वातावरण होतं. त्या आनंदात सुट्या कधी संपल्या समजलंही नाही. ऐश्वर्या जेव्हा कंपनीत जॉईन झाली तेव्हा तिथली भव्यता बघून चकित झाली. बंगळुरूच्या आयटी हबमध्ये एका मल्टी स्टोरीड बिल्डिंगच्या सहाव्या माळ्यावर कंपनीचं आलिशान ऑफिस होतं.

सकाळी दहा वाजता कंपनीतले सर्व कर्मचारी मिनी ऑडिटोरियममध्ये पंधरा मिनिटं मेडिटेशन करायचे. त्यानंतर सर्व आपापल्या डिपार्टमेंटला निघून जायचे. ज्यूनिअर कर्मचाऱ्यांसाठी हॉलमध्ये लहान लहान क्यूबिकल्स होती. मॅनेजर आणि इतर वरच्या ऑफिसर्ससाठी केबिन्स होती. सर्व क्यूबिकल्स अन् केबिनची सजावट एकारखीच होती. त्यावरून कंपनीच्या ऐश्वर्याचा अंदाज करता येत होता.

ऐश्वर्याचं काम प्रोजेक्ट मॅनेजर सुशांतच्या टीममध्ये होतं. सुशांतची गणना कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये व्हायची. आपल्या योग्यतेमुळेच त्यानं फार लवकर इतकी वरची जागा मिळवली होती.

पहिल्याच दिवशी त्यानं ऐश्वर्याचं स्वागत करत म्हटलं होतं, ‘‘ऐश्वर्या, आमच्या टीममध्ये तुझं स्वागत आहे. माझी टीम कंपनीची लीड टीम आहे. कंपनीचे सर्वात महत्त्वाचे प्रोजेक्ट या टीमला मिळतात. मला खात्री आहे, तुझ्या येण्यामुळे आमची टीम अधिक बळकट होईल.’’

‘‘सर, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.’’ ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर शालीन आत्मविश्वास झळकत होता.

सुशांत खरंच बोलला होता. कंपनीचे महत्त्वाचे प्रोजेक्ट त्यांच्याच टीमला मिळत होते. अर्थातच इतरांच्या मानानं या टीमच्या लोकांना मेहनतही अधिक करावी लागत होती. बघता बघता नोकरीचा एक महिना संपलासुद्धा. या काळात ऐश्वर्याला फार काम दिलं गेलं नाही पण तिला कामाचं स्वरूप, कामाची पद्धत समजून घेता आली. खूप काही शिकायला मिळालं.

पहिला पगार मिळताच तिनं पंचवीस हजार रूपयांची खरेदी केली आणि विमानाचं तिकिट काढून ती घरी लखनौला पोहोचली.

‘‘मम्मा, ही बघ बंगलोर सिल्कची साडी अन् पश्मिता शाल…तुझ्यासाठी.’’

आईच्या खांद्यावर साडी ठेवत ती म्हणाली, ‘‘बघ किती छान दिसतेय तुला.’’

मम्मा खूप खुश झाली. खरंच साडी अन् शाल सुंदरच होती.

‘‘पप्पा, हा तुमच्यासाठी सूट आणि हे घडयाळ…’’ दोन पाकिटं बाबांना देत तिनं म्हटलं.

सूट पप्पांच्या आवडीच्या रंगाचा होता. घड्याळही एकदम भारी होतं. त्यांचाही चेहरा खुलला.

‘‘केवढ्याला गं पडलं हे सगळं?’’ शालवरून हात फिरवत आईनं विचारलं.

‘‘फार नाही गं! पंचवीस हजार रूपये खर्च झाले.’’ हसून ऐश्वर्याने म्हटलं.

ऐकून आईचे डोळे विस्फारले…‘‘अन् आता सगळा महिना कसा काढशील?’’

‘‘जसा आधी काढत होते…पप्पा झिंदाबाद,’’ खळखळून हसंत ऐश्वर्यानं म्हटलं.

‘‘बरोबर आहे. अजून माझ्या रिटायरमेंटला अवकाश आहे. मी माझ्या लेकीला सहज पोसू शकतो.’’ बाबाही हसत म्हणाले.

दोन दिवस राहून ऐश्वर्या परत कामावर रूजू झाली. दुसऱ्याच दिवशी तिच्या सिनिअरनं लंच नंतर तिला एक टास्क करायला दिला. ऐश्वर्या मन लावून काम करत होती पण टास्क पूर्ण झाला नव्हता. सात वाजून गेले होते. बरेचसे एम्प्लॉई घरी निघून गेले होते. ती काम करत बसली होती.

‘‘ऐश्वर्या मॅडम, अजून घरी गेला नाहीत तुम्ही?’’ आपल्या चेंबरमधून बाहेर पडलेल्या सुशांतची नजर ऐश्वर्यावर पडली.

‘‘सर, एक टास्क होता. अजून पूर्ण झाला नाहीए. पण मी करेन…’’

‘‘मला बघू देत. काय आहे ते कळेल.’’ सुशांतनं म्हटलं.

ऐश्वर्या कॉम्प्युटर समोरून बाजूला झाली. सुशांतनं काही क्षण स्क्रीनवर ओपन असलेल्या प्रोग्रॅमकडे बघितलं अन् मग त्याची बोटं सराईतपणे की बोर्डवर काम करू लागली.

पाच सात मिनिटातच सुशांत हसत बाजूला झाला. ‘‘हा घ्या तुमचा टास्क पूर्ण झाला.’’

किती वेळ ऐश्वर्या जे काम करत बसली होती ते सुशांतनं इतक्या कमी वेळात पूर्ण केलं होतं. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी तिच्या मनात आदर व कौतुक दाटून आलं.

‘‘थँक्यू सर,’’ अत्यंत कृतज्ञतेनं तिनं म्हटलं.

‘‘त्याची गरज नाहीए,’’ मंद स्मित करत त्यानं म्हटलं, ‘‘त्यापेक्षा माझ्याबरोबर एक कप कॉफी घेणार का?’’

ऐश्वर्याही दमलीच होती. तिलाही गरम चहा किंवा कॉफीची गरज होती. तिनं लगेच होकार दिला.

सुशांतनं तिला एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. हॉलमध्ये बरीच गर्दी होती. पण वर टेरेसवरही बसायची सोय होती. तिथं गर्दीही बेताची होती. वातावरण शांत होतं. टेरेसवरून बाहेरचं दृश्यही दिसत होतं. शहरातले दिवे बघून तारे जणू पृथ्वीवर उतरले आहेत असं वाटत होतं.

‘‘ऐश्वर्या, कंपनीतर्फे दोन इंजिनिअर्सना अमेरिकेला पाठवायचं आहे. तू त्यासाठी अप्लाय का केलं नाहीस?’’ कॉफीचा घोट घेत सुशांतनं विचारलं.

‘‘सर, मी अजून अगदीच नवी आहे ना, म्हणून मी अप्लाय केलं नाही.’’

‘‘प्रश्न नवं किंवा जुनं असण्याचा नाहीए, प्रश्न हुशारीचा, टॅलेंटचा आहे. आणि प्रामाणिकपणा अन् हुशारी तुझ्यात आहेच. तू अप्लाय करायला हवंस. तीन लाख रूपये दर महिन्याला, शिवाय कंपनीतर्फे बोनस…एक वर्षांनंतर परत आल्यावर तुझी मार्केटव्हॅल्यू केवढी वाढलेली असेल विचार कर.’’ सुशांत शांतपणे तिला समजावून सांगत होता.

‘‘पण सर, तरीही मी खूप ज्यूनिअर आहे, माझ्याहून सीनियर्सही आहेत. तरी माझी निवड होईल?’’

‘‘त्याची काळजी करू नकोस. हा प्रोजेक्ट माझा आहे. कोणाला अमेरिकेला पाठवायचं, कोणाला नाही, हा निर्णय माझा असेल.’’

ऐश्वर्याला लगेच निर्णय घेता येईना. ती विचार करत होती.

कॉफी संपवून सुशांतनं म्हटलं, ‘‘घाई नाहीए. नीट विचार करून सांग. उद्या सायंकाळी आपण इथंच भेटूयात. त्यावेळी तुझा निर्णय सांग.’’

ऐश्वर्या घरी आली. शांतपणे विचार केला तेव्हा तिला जाणवलं की ही संधी चांगली आहे. सहा महिन्यात पप्पा आता रिटायर होतील. तिचं पॅकेज जरी वर्षांला साडेचार लाखाचं होतं तरी हातात सध्या फक्त तीस हजार रूपये येत होते. एवढ्यात तिचं जेमतेम भागत होतं, घरी पाठवायला पैसेच उरत नव्हते. तिनं ठरवलं अमेरिकेची संधी घ्यायचीच.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी ती जेव्हा रेस्टॉरंटच्या गच्चीवर पोहोचली, तेव्हा सुशांत तिची वाट बघत उभा होता. मंद आवाजात वाद्यसंगीत वाजत होतं. फारच प्रसन्न सायंकाळ होती.

ऐश्वर्यानं जेव्हा अमेरिकेला जायला तयार असल्याचं सांगितलं, तेव्हा सुशांत म्हणाला, ‘‘योग्य निर्णय घेतला आहेस तू. तिथून परतल्यावर तुझ्या करिअरला अधिकच झळाली मिळेल. मी प्रयत्न करेन…आपली सहयोगी कंपनी तुझ्या राहण्याचीही सोय करेल.’’

हे ऐकल्यावर तर ऐश्वर्याचा चेहरा एकदम खुलला. अमेरिकेत राहण्याचा खर्च फार येतो हे ती ऐकून होती. मग तर एका वर्षांत ती बराच पैसा वाचवू शकली असती. तिनं कृतज्ञतेनं म्हटलं, ‘‘सर, तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय, त्याची परतफेड मी कशी करेन तेच मला कळत नाहीए.’’

‘‘मनात आणलंस तर तू आजही करू शकतेस.’’ सुशांतने म्हटलं.

‘‘कशी?’’ नवल वाटून ऐश्वर्याचे टपोरे डोळे अधिकच विस्फारले.

‘‘असं बघ, हे जग ‘गिव्ह अॅन्ड टेक’च्या फॉर्मुल्यावर चालतं. टीचर विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा तो फी घेतो. डॉक्टर रोग्यावर उपचार करतो तेव्हा तो पैसे घेतो, अगदी आईवडिलही मुलाला वाढवतात, तेव्हा म्हातारपणी त्यानं आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा असतेच. सरकार जनतेसाठी ज्या सोयी, सुविधा, सेवा पुरवते त्याचा मोबदला टॅक्सरूपात घेतेच. एकूणात या जगात फुकटात काहीही मिळंत नसतं.’’ सुशांत एखाद्या तत्त्वत्याप्रमाणे बोलत होता. ऐश्वर्या फार गोंधळली होती…तिला समजेना काय नेमकं सांगताहेत सुशांत सर. तिनं चाचरत विचारलं, ‘‘म्हणजे मला काय करावं लागेल?’’

‘‘फक्त काही दिवसांसाठी माझी हो. मी तुला करिअरच्या अशा उंचीवर पोहोचवेन की लोकांना तुझा हेवा वाटावा,’’ सुशांतनं थेट तिच्या डोळ्यात बघत म्हटलं.

सगळी गच्ची आपल्या भोवती फिरतेय असं वाटलं ऐश्वर्याला. कॉलेजात कायम तिनं टॉप केलं होतं. पण इथं तिच्या बुद्धिचं अन् योग्यतेचं महत्त्वच नव्हतं. ती फक्त एक यादी होती. तारूण्याचा सौदा करत होता सुशांत. फक्त देह व्यापाराचा एक सुसंस्कृत प्रस्ताव समोर ठेवून अपमान जिव्हारी लागला होता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

‘‘ऐश्वर्या, मी बळजबरी करत नाहीए. ही एक ऑफर आहे. तुला कबूल असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. कंपनीतल्या तुझ्या पोझिशनला काहीही धक्का लागणार नाही. तू नेहमीप्रमाणेच आपलं काम करत राहशील.’’ अत्यंत मृदू अन् गोड शब्दात सुशांतनं म्हटलं.

‘‘क्षमा करा सर, तुम्ही मला समजण्यात चूक केलीत. मी विकाऊ नाही.’’ अश्रू कसेबसे थोपवत ऐश्वर्या उठून उभी राहिली.

‘‘अरे? उठलीस का? निदान कॉफी तर घे,’’ एक शब्दही न बोलता ऐश्वर्या तिथून निघाली ती सरळ आपल्या फ्लॅटवर पोहोचली. घरी येऊन मात्र तिचा बांध फुटला. तिला रडू आवरेना, नोकरीतल्या यशासाठी शॉटकट घेणाऱ्या अनेक मुलींबद्दल तिनं ऐकलं होतं. पण तिलाही त्या परिस्थितीचा सामना करावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता पुढे काय? इथं काम करणं जमेल का? सुशांत या गोष्टीचा वचपा म्हणून तिच्यासाठी अडचणींचा डोंगर उभा करेल…तर मग नोकरी सोडायची का?…पण तिनं तर दोन वर्षांचा बॉन्ड करून दिलाय…

त्या रात्री ती जेवली नाही. झोपही लागली नाही. काय करावं ते कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती घाबरतच ऑफिसला पोहोचली. तिला वाटलं होतं सुशांत तिला फैलावर घेईल. पण त्याची वागणूक अगदी नॉर्मल होती. जणू काही घडलंच नव्हतं.

आठवडाभर ऐश्वर्या भेदरलेलीच होती. पण मग नॉर्मल झाली. तिला वाटलं, सुशांतला आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला असावा. नंतर एक दिड महिना गेला. सगळंच आलबेल होतं.

एक दिवस सुशांतने तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावून म्हटलं, ‘‘ऐवर्श्या, अमेरिकेतले हे आपले खास क्लाएंट आहे. त्यांचा हा जरूरी प्रोजक्ट आहे. अठ्ठेचाळीस तासात पूर्ण करायचा आहे. करू शकशील?’’

‘‘मी पूर्ण प्रयत्न करते सर.’’

‘‘गुड! हे कंपनीचे खास क्लाएंट आहेत, त्यामुळे कुठंही काहीही चूक व्हायला नको हे लक्षात ठेवायचं.’’ सुशांतनं सांगितलं.

‘‘ओके सर,’’ म्हणत ऐश्वर्या आपल्या सीटवर येऊन बसली. तिनं आधी तो प्रोजेक्ट पूर्ण वाचला तेव्हा तिला वाटलं, हे तर सोपं आहे. ती सहजच पूर्ण करू शकेल.

ऐश्वर्यानं काम सुरू केलं, पण तिचा अंदाज चुकला. जसजशी ती प्रोजेक्टवर पुढे जात होती तसतसा तो अधिकच क्लिष्ट होत होता. दुपारपर्यंत ती फारसं काही करू शकली नाही. अठ्ठेचाळीस तासात हे काम पूर्ण होणार नाही याची तिला जाणीव झाली.

लंचनंतर ती सुशांतला या संदर्भात विचारायला गेली, पण तो कुठल्या तरी मिटिंगसाठी बाहेरगावी गेला होता. तो दुसऱ्याच दिवशी येणार होता म्हणून कळलं. तिनं इतर सिनियर्सशीही बोलून बघितलं, पण या क्लाएंटचा असा प्रोजेक्ट कुणीच केलेला नसल्यानं कुणीच तिला मदत करू शकलं नाही.

दुसऱ्या दिवशी ऑफिसात आल्या आल्या सुशांतनं तिचं काम बघितलं, अन् तो भडकलाच, ‘‘काय हे? तू काहीच काम केलं नाहीए? मी नव्हतो ऑफिसात तर हातावर हात ठेवून बसून राहिलीस?’’

‘‘तसं नाही सर, यात काही प्रॉब्लेम आले. मी इतर सिनियर्सना विचारलं, पण कुणीच सांगू शकलं नाही. शेवटी मी क्लांयटलाही दुपारी फोन लावले, पण त्यांनी उचलला नाही.’’ ऐश्वर्यानं तिची अडचण सांगितली.

‘‘ऐश्वर्या, शुद्धीवर आहेस का तू?’’ सुशांत केवढ्यांदा ओरडला. ‘‘अगं, शिकलेली, आयटी कंपनीत नोकरी करणारी तू. तुला एवढंही कळू नये? तू जेव्हा फोन करत होतीस तेव्हा अमेरिकेत रात्र होती अन् त्यावेळी लोक झोपलेले असतात. नशीब म्हणायचं की त्याची झोपमोड झाली नाही, नाही तर तुझी नोकरीच गेली असती.’’

‘‘पण सर, मी काय करायचं?’’ ऐश्वर्याला आपल्या हतबलतेमुळे रडूच फुटलं.

‘‘आपलं डोकं वापरायचं आणि काम पूर्ण करायचं.’’ सुशांत संतापून म्हणाला. मग त्यानं प्रोजेक्टबद्दल तिला काही सूचना केल्या अन् तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला.

ऐश्वर्यानं शर्थ केली पण प्रोजेक्ट त्या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही. सुशांतनं तिला मेमो दिला.

हळूहळू सुशांतचा खरा रंग दिसायला लागला. तो मुद्दामच सर्वात कठिण टास्क ऐश्वर्याला द्यायचा. कमी वेळात तो पूर्ण व्हायला हवा म्हणायचा. अन् काम पूर्ण      झालं नाही तर सरळ मेमो हातात द्यायचा. शिवाय अत्यंत अपमानास्पद भाषा वापरून रागवायचा.

एक दिवस ऑफिसात गेल्या गेल्याच ऐश्वर्याला त्यान बोलावून घेतलं, ‘‘तीन महिन्यात अकरा मेमो मिळालेत तुला. कामात सुधारणा झाली नाही तर कंपनी तुम्हाला डिसमिस करू शकते. ही शेवटची संधी आहे.’’

अपमानित ऐश्वर्या आपल्या सीटवर येऊन बसली. जर बोलल्याप्रमाणे तिला खरोखर डिसमिस केलं गेलं तर तिला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणं अशक्य होऊन बसेल. त्यापेक्षा आपणच राजिनामा दिला तर? पण तिनं तर दोन वर्षांचा बॉन्ड भरून दिलाय. नोकरी सोडली तर तिला कंपनीला पाच लाख रूपये द्यावे लागतील. तीन महिन्यांनी पप्पा रिटायर होतील. इतकं असहाय्य वाटलं ऐश्वार्याला…डोळयांत पाणीच आलं तिच्या.

‘‘काय झालं गं ऐश्वर्या? इतकी उदास का आहेस? कसली काळजी वाटतेय?’’ स्नेहानं तिच्या खांद्यावर हात ठेवत आपलेपणानं विचारलं. हल्ली त्यांची चांगली मैत्री झाली होती.

ऐश्वर्याला बोलावसं वाटलं…पण काय सांगणार? तिच्या डोळयातून टपटप अश्रू वहायला लागले.

‘‘इथं नको, कॅन्टीनमध्ये बसूयात.’’ स्नेहानं हात धरून तिला सीटवरून उठवलीच.

स्नेहानं तिला त्यांच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये न नेता दुसऱ्या मजल्यावरच्या एका कॅन्टीनमध्ये नेलं. सकाळची वेळ असल्यामुळे तिथं गर्दी नव्हती. स्नेहानं खोदून खोदून विचारल्यावर ऐश्वार्या हुंदके देत सगळी हकिकत सांगितली. स्नेहाचा चेहरा संतापानं लाल झाला.

‘‘याचा अर्थ हा चांडाळ, हा घृणित खेळ तुझ्याबरोबरही खेळतोय.’’ दात ओठ खात तिनं म्हटलं.

‘‘ ‘तुझ्या बरोबरही’चा काय अर्थ?’’ दचकून ऐश्वार्यनं विचारलं.

‘‘अगं, त्यानं मलादेखील अमेरिकेला जाण्याची लालूच दिली होती. मी नकार दिल्यानंतर गेले दोन महिने मलाही छळतोय.’’ स्नेहानं सांगितलं.

विचार करत ऐश्वर्या बोलली, ‘‘याचा अर्थ ज्या दोघी मुली अमेरिकेला गेल्या आहेत, त्यांनी याची अट मान्य…’’ ऐश्वर्यानं वाक्य पूर्ण करण्याआधीच त्वेषानं स्नेहा बोलली, ‘‘त्यांचं खरं खोटं त्या जाणोत. पण या माणसाचं सत्य आपल्याला ठाऊक आहे. याला धडा शिकवायलाच हवा, नाहीतर हा नेहमीच नव्या मुलींना खेळणं समजून त्यांच्या चारित्र्याशी खेळत राहील.’’

‘‘पण…पण आपण काय करू शकतो?’’

स्नेहानं कॉफी घेता घेता तिच्या डोक्यातली योजना ऐश्वर्याला समजावून सांगितली. सगळा बारीक सारीक तपशील नीट समजून घेतला गेला. त्यानंतर दोघी पुन्हा आपल्या ऑफिसात आल्या.

त्यानंतर लंचच्या थोड्या आधी ऐश्वर्या सुशांतच्या चेंबरमध्ये गेली. ‘‘सर, थोडं बोलायचं आहे.’’

‘‘अं?’’

‘‘सर, मला या ऑफिसात काम करणं जमत नाहीए.’’

‘‘तर?’’

‘जर अजूनही शक्य असेल तर मी अमेरिकेला जायला तयार आहे, तुम्ही मदत केलीत तर मोठीच कृपा होईल.’’

‘‘शक्य, अशक्य सगळं माझ्याच हातात आहे, पण तिथं जाण्याची अट तुला माहीत आहे…ती मान्य असेल तर बघ…’’ सुशांतनं तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हटलं.

‘‘सर, इतक्या घाईत मी सांगू शकणार नाही…पण आज सायंकाळी तुम्ही माझ्या फ्लॅटवर याल का? तोपर्यंत मी अजून नीट विचार करून तुम्हाला निर्णय सांगेन.’’

‘‘ओ के बेबी, बरोबर आठ वाजता मी पोहोचतो.’’ आपला आनंद लपवत सुशांतनं म्हटलं.

कसाबसा तो दिवस ऐश्वर्यानं रेटला. सायंकाळी घरी आली. स्नान करून सुंदर साडी नेसली. मेकअप केला. तिचं हृदय धडधडत होतं पण निर्णय पक्का होता.

बरोबर आठ वाजता दाराची बेल वाजली. तिनं दार उघडलं. दारात सुशांत उभा होता. त्यानं आत येऊन दार लावून घेतलं अन् ऐश्वर्याकडे बघून म्हणाला,

‘‘साडीत सुंदर दिसते आहेस तू?’’

ऐश्वर्यानं काहीच उत्तर दिलं नाही. तिच्याजवळ जात सुशांतनं म्हटलं, ‘‘आजची रात्र एकदम स्पेशल, संस्मरणीय कर. मी तुला नक्की अमेरिकेला पाठवतो.’’

ऐश्वर्यानं अंग चोरून घेतलं. तिचं गप्प राहणं म्हणजे तिची स्वीकृती समजून सुशांतची हिम्मत वाढली. त्यानं तिला पटकन मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं.

कसंबसं स्वत:ला सोडवून घेत तिनं म्हटलं, ‘‘सर, हे काय करताय तुम्ही?’’

‘‘तुझं करीयर घडवाचंय ना? त्याची तयारी.’’

पुन्हा तिला मिठीत घेत त्यानं तिचं चुंबन घ्यायचा प्रयत्न केला.

‘‘करियर घडवताय की आयुष्य नासवताय?’’ संतापून ऐश्वर्यानं विचारलं.

‘‘ऐशू, इतक्या जवळ आल्यावर आता मागे फिरता येणार नाही. तुझ्या प्रोबेशन पिरियड संपता संपता मी तुला प्रमोशन पण देतो…फक्त जे घडतंय ते घडू दे.’’ सुशांत आता चांगलाच पेटला होता.

‘‘घडूही दिलं असतं…पण…’’

‘‘पण काय?’’

‘‘जर या लॅपटॉपचा वेब कॅमेरा ऑन नसता तर,’’ ऐश्वर्यानं टेबलावरच्या लॅपटॉपकडे बोट दाखवलं.

लॅपटॉप बघताच सुशांतनं दचकून उडीच मारली. जणू समोर मोठ्ठा साप बघितला असावा. त्यानं घाबरून विचारलं, ‘‘कॅमेरा ऑन आहे?’’

‘‘फक्त ऑनच नाहीए. तर या कॅमेऱ्यातील सर्व गोष्टी दूर कुठं तरी रेकॉर्डही होत आहेत.’’ ऐश्वर्या शांतपणे म्हणाली.

सुशांत प्रचंड घाबरला, ‘‘रेकॉर्डिंग होतंय?’’

‘‘होय सर, तुम्हा सारख्यांना फक्त स्त्रीचं शरीर दिसतं. तिची बुद्धी, तिची श्रम करण्याची तयारी, तिची योग्यता यांची काहीच किंमत नसते का? तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, तेवढाच आम्हीही केलाय. तुम्ही नोकरीत पुढे जाता पण आम्ही जाऊ म्हटलं तर आम्हाला अब्रूची किंमत द्यावी लागते. पण आता तसं होणार नाही. तू आता आमचं शोषण करू शकणार नाहीस. तुला तुझ्या दृष्टकृत्याची किंमत मोजावीच लागेल.’’ ऐश्वार्यानं म्हटलं.

सुशांतचा चेहरा पांढराफटक झालेला. त्यानं घाईनं लॅपटॉप बंद केला.

‘‘एवढ्यानं काही होणार नाही. अजून एक छुपा कॅमेरा सगळं चित्रण करतोय. तुझ्या पापाचा घडा भरलाय सुशांत.’’

‘‘अजून एक कॅमेरा?’’ सुशांत प्रचंड घाबरला होता.

‘‘तुझ्यासारख्या विषारी सापांपासून सावध राहायला त्याची गरज होतीच ना?’’ तिरस्कारानं हसत ऐश्वयानं म्हटलं, ‘‘तुझी नोकरी आता संपली आजच हे रेकॉर्डिंग कंपनीच्या चेयरमेनकडे पोहोचवलं जाईल.’’

‘‘असं करू नकोस, अगं, माझी लहान लहान मुलं आहेत. त्यांचं आयुष्य मातीमोल होईल. माझी पत्नी रस्त्यावर येईल.’’ हात जोडून सुशांत गयावया करत होता.

‘‘कंपनीतला स्टाफही खरं मुलांसारखाच असतो. आमची नाही दया आली?’’

‘‘प्लीज, प्लीज मला क्षमा कर. माझ्या पत्नीला हे कळलं तर ती आत्महत्त्या करेल…’’ सुशांतनं अक्षरश: ऐश्वर्याचे पाय धरले.

ज्या सर्वशक्तीमान सुशांतसमोर कंपनीचा स्टाफ घाबरून असायचा तोच आज ऐश्वर्याच्या पायावर लोळण घेत होता.

तिरस्कारानं त्याच्याकडे बघत ऐश्वर्यानं म्हटलं, ‘‘मला किंवा कुणालाच यापुढे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं धाडस करू नका, पण जे केलंय त्याची शिक्षा भोगावीच लागेल.’’

‘‘माझी नोकरी गेली तर त्याची शिक्षा माझ्या कुटुंबाला भोगावी लागेल. त्यांच्यासाठी मला क्षमा कर. मी वचन देतो यापुढे मी अजिबात अशी वागणूक ठेवणार नाही. म्हणंत असशील तर कंपनी सोडून जातो.’’

ऐश्वर्यानं काही उत्तर देण्याआधीच तिचा मोबाइल वाजला. फोन नेहाचा होता. तिनं मोबाइल ऑन करून स्पीकरवर टाकला. नेहाचा आवाज ऐकू आला. ‘‘ऐश्वर्या, तो बरोबर बोलला. त्याच्या दृष्कृत्याची शिक्षा त्याच्या बायकोमुलांनी का भोगावी? त्यांचा काय दोष आहे? मी सर्व रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवलंय. गरज पडल्यास त्याची वापरही करू. पण सध्या त्याला एक संधी द्यायला हवी.’’

‘‘ठीक आहे.’’ ऐश्वर्यानं मोबाइल बंद केला. त्याच्याकडे बघत तिनं म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुझ्या पापाची फळं तुझ्या कुटुंबाला भोगावी लागू नयेत म्हणून आम्ही सध्या पुढली अॅक्शन घेत नाहीए. मात्र यापुढे सावध राहा.’’

‘‘धन्यवाद! खूप खूप धन्यवाद…मी उद्याच या कंपनीचा राजिनामा देतो.’’

‘‘त्याची गरज नाही. उलट तू इथं आमच्या डोळ्यांपुढेच असायला हवा. आमची नजर असेल तुझ्यावर…आणि मी आता तुझ्या बरोबर काम करणार नाही. तू आपली टीम बदल. काय कारण द्यायचं ते मॅनेजमेंटला दे,’’ ऐश्वर्यानं कडक आवाजात तंबी दिली.

सुशांतला बदलत्या काळातल्या स्त्री शक्तीचा अंदाज आला होता. आता तो स्त्री शक्तीला कमी लेखणार नव्हता. थकलेल्या पावलांनी त्यांने आपल्या घराचा रस्ता धरला.

पुनर्विवाह

कथा * कुसुम आगरकर

पूजा दिल्लीच्या या नव्या कॉलनीत राहायला आल्यापासून तिचं लक्ष सतत समोरच्या फ्लॅटकडे असायचं. तो फ्लॅट तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीच्या अगदी समोर पडायचा. काहीसं गूढ पण मनाला ओढ लावणारं घर असं तिनं त्याचं नाव ठेवलं होतं. सुमारे ३०-३५ वर्षांचा एक पुरूष सतत आतबाहेर करताना दिसायचा. त्याची धावपळ कळायची. एक वयस्कर जोडपंही अधूनमधून दिसे. ५-६ वर्षांचा एक गोजिरवाणा मुलगाही दिसायचा.

त्या घराविषयीची पूजाची उत्सुकता अधिकच चाळवली जेव्हा त्या घरात तिला एक तरूण सुंदर मुलगीही दिसली. क्वचितच ती बाहेर पडत असावी. तिचा सुंदर निरागस चेहरा आणि उन्हाळ्यातही तिनं डोक्याला बांधलेला स्कार्फ बघून पूजाचं कुतुहुल आणखी वाढलं.

शेवटी एकदा पूजानं तिच्या दूधवाल्या गवळ्याला विचारलंच, ‘‘भाऊ, तुम्ही समोरच्या घरातही रतीब घालता ना? कोण कोण राहतं तिथं?’’

हे ऐकून दूधवाल्यानं सांगितलं, ‘‘ताई, गेली वीस वर्षं मी त्यांच्याकडे रतीब घालतोय. पण हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी फारच वाईट ठरलं आहे.’’ बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले, कंठ दाटून आला. कसाबसा तो बोलला, ‘‘कधी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये.’’

‘‘भाऊ शांत व्हा…मी सहजच बोलले…’’

पूजाला थोडं अपराधी वाटलं. तरीही नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली.

दूधवाल्यालाही कुठं तरी मन मोकळं करावं असं वाटलं असावं. तो स्वत:ला सावरून बोलायला लागला, ‘‘काय सांगू ताई. लहानशी, भाहुलीसारखी होती सलोनी, तेव्हापासून दूध घालतोय मी. बघता बघता ती मोठी झाली. अशी गुणी, हुशार अन् सुंदर पोर की तिला कुणीही पसंत करावी. पण तिच्यासारख्या रत्नासाठी तेवढंच तोलामोलाचं स्थळ हवं होतं.

‘‘एक दिवस आकाशसाहेब त्यांच्या घरी आले. स्वत:ची ओळख करून देऊन म्हणाले की कदाचित सलोनीनं तुम्हांला सांगितलं नसेल पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे अन् आम्हाला लग्न करायचं आहे.

‘‘आकाशसाहेब स्वत: दिसायला चांगले, उच्चशिक्षित, उत्तम नोकरी, चांगलं घराणं, एकुलता एक मुलगा…अजून काय हवं? सलोनीच्या आईवडिलांना एकदम पसंत पडले. त्यांनी म्हटलं, ‘‘आम्हाला जावई म्हणून तुम्ही पसंत आहात, पण तुमच्या आईवडिलांना हे नातं पसंत आहे का?’’

‘‘हे ऐकून आकाशसाहेब उदास मनाने मग बोलले की त्यांचे आईवडिल कार अपघातात दोन वर्षांपूर्वी वारले. काका, काकू, मामामामी, मावशी आत्या वगैरे सर्व नातलग आहेत. त्यांना हे लग्न पसंत आहे.’’

‘‘आमच्याकडून लग्नाला होकार आहेच पण तुम्हाला एक विनंती आहे की लग्नानंतरही तुम्ही सलोनीसह इथं वरचेवर यावं. ती आमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही दोघं इथं येत राहिलात की आम्हालाही एकटं वाटणार नाही. शिवाय तुमच्या रूपानं आम्हाला मुलगा मिळेल.’’

आकाशला त्यात काहीच अडचण नव्हती. थाटामाटात लग्न झालं. वर्ष दीड वर्षात बाळही झालं.

‘‘मग हे तर सर्व फारच छान आहे…तुम्हाला वाईट कशाचं वाटतंय?’’ पूजानं आश्चर्यानं विचारलं.

‘‘सांगतो ना,’’ दूधवाल्यानं म्हटलं. एकदा दूध घालायला गेलो तर घरात आकाशसाहेब, सलोनी अन् शौर्य बाळ सगळेच बसलेले दिसले. सलोनी तर खूपच दिवसांनी भेटली म्हणताना मी म्हटलं, ‘‘कशी आहेस सलोबेबी? किती दिवसांनी दिसते आहेस? येत जा गं लवकर…आम्हालाही फार आठवण येते तुझी.’’ पण मला नवल वाटलं, काका,काकी वरून माझ्याशी अत्यंत प्रेमानं आदरानं बोलणारी माझी सलोबेबी काहीही उत्तर न देता आत निघून गेली. मला वाटलं, लग्न झाल्यावर मुली परक्या होतात, दुरावतात, कधीकधी त्यांना सासरच्या श्रीमंतीचा गर्व होतो. मी मुकाट्यानं तिथून निघालो. पण मला नंतर समजलं की सलोनीला तिचा आजारानं थकलेला, उदास चेहरा मला दाखवायचा नव्हता. एरवी सतत आनंदी असणारी, उत्सहानं सळसळणारी…तिला ब्लड कॅन्सर झाला होता.

यावेळी ती इथं उपचारासाठी आली होती. तिचा ब्लड कॅन्सर थर्ड स्टेजमध्ये होता. औषधा पाणी, प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती पण गुण येत नव्हता.

सगळ्यात नामवंत हुषार डॉक्टरांनाही दाखवलं. सलोबेबीची तब्येत दिवसेदिवस खालावते आहे. वारंवार किमो थेरेपीमुळे लांबसडक केस गळून टक्कल पडलंय, म्हणूनच तिला सतत स्कार्फ बांधावा लागतो. कितीवेळा रक्त बदललं…कुठं काही कमी नाहीए उपचारांत. आकाशासाहेब तर सर्व कामं सोडून तिच्या उशाशी बसून राहतात. खूप प्रेम आहे त्यांचं तिच्यावर.

दूधवाला निघून गेला. सायंकाळी विवेक ऑफिसमधून घरी परतल्यावर पूजानं त्याला सकाळची सगळी कहाणी ऐकवली. ‘‘या दुखद कथेतला चांगला भाव म्हणजे आकाश एक अत्यंत चांगला नवरा आहे. सलोनीची इतकी सेवा करतोय. लग्न संसार पूर्णपणे भिनलेत त्याच्या वृत्तीत. नाही तर हल्लीची ही तरूण मुलं, लिव्ह इन रिलेशनशिप काय अन् सतत भांडणं, सेपरेशन आणि घटस्फोट काय…’’

एकदम तिच्याच लक्षात आलं, ऑफिसातून थकून आलेल्या नवऱ्याला चहा तरी विचारायला हवा. आल्या आल्या हे काय पुराण सुरू केलं. ती स्वयंपाकघराकडे वळली. तिचं लक्ष समोरच्या घराकडे गेलं.

आज तिथं बरीच गडबड सुरू होती. घरात माणसांची संख्याही वाढली होती. काही तरी बोलणं वगैरे सुरू होतं. तेवढ्यात एम्बुलन्सचाही आवाज आला…पूजा एकदम स्तब्ध झाली…सलोनीला काही…?

पूजाची शंका खरी ठरली. सालोनीची तब्येत फारच बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलला हलवलं होतं. त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती तरी पूजा अन् विवेक दुसऱ्यादिवशी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले…आकाशची तडफड बघवत नव्हती. डॉक्टरांनी हात टेकले होते. शेवटी तेच घडलं. त्याच रात्री सलोनीची प्राणज्योत मावळली.

त्यानंतर सुमारे दोन अडीच महिन्यांचा काळ उलटला. त्या घराकडे लक्ष गेलं की पूजाला सलोनीचा तो सुंदर निरागस चेहरा आठवायचा. आकाशची तडफड आठवायची. ‘‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’ हे पटायचं अन् कर्तव्यदक्ष, प्रेमळ नवरा म्हणून आकाशचं कौतुक वाटायचं.

त्यादिवशी दुपारी दोनचा सुमार असेल. सर्व कामं आटोपून पूजा दुपारी आडवी होणार, तेवढ्यात दाराची घंटी वाजली. दारात एक स्त्री उभी होती. तिला हल्लीच समोरच्या घरात पूजानं बघितलं होतं.

‘‘आमंत्रण द्यायला आलेय. मोठ्या मालकीणबाईंनं पाठवलंय मला.’’

‘‘काय आहे?’’

‘‘उद्या लग्न आहे. नक्की या.’’

पूजा काही बोलेल, विचारेल इतकाही वेळ न देता ती तडक निघून गेली. बहुधा ती फार घाईत असावी.

ती निघून गेली…जाता जाता पूजाची झोप उडवून गेली. पूजा विचार करत होती. कुणाचं लग्न असावं? कारण लग्नाच्या वयाचा कुणीच तरूण किंवा तरूणी त्या घरात नव्हते.

सायंकाळी विवेक येताच पूजानं मनातली खळबळ त्याच्यासमोर मांडली. तिला वाटत होतं की तिच्याप्रमाणेच विवेकही चकित होईल, विचार करेल, कुणाचं लग्न? पण तसं काहीच झालं नाही. तो नेहमीप्रमाणे शांतच उभा होता. सहज म्हणाला, ‘‘शेजारी आहेत आपले. जायला हवं.’’

‘‘पण तुम्हाला माहीत आहे का लग्न कुणाचं आहे ते? कुणाच्या लग्नाला आपण जाणार आहोत?’’ पूजानं जरा नाराजीनंच विचारलं. तिला वाटलं विवेक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय.

‘‘अगं, लग्न आकाशचंच आहे, शौर्यचं तर लग्न करता येणार नाही ना? किती लहान आहे तो? सलोनीच्या आईवडिलांचीच इच्छा आहे की लग्न लवकर व्हावं. कारण आकाशला याच महिन्यांत ऑफिसच्या कामानं परदेशी जायचं आहे. गेले कित्येक महिने सलोनीच्या आजारपणामुळे तो हा प्रवास टाळत होता. सलोनीच्या चुलत बहिणीशीच त्याचं लग्न होतंय.’’

हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं तिला. ज्या आकाशबद्दल आदर्श नवरा म्हणून तिला प्रचंड आदर आणि कौतुक वाटत होतं. तो आकाश बायकोच्या मृत्युला दोन महिने होताहेत तोवरच पुन्हा बोहल्यावर चढतोय? मग ते प्रेम, ती सेवा, ती तडफड सगळा देखावाच होता का?

नवऱ्याच्या आयुष्यातलं बायकोचं स्थान फक्त ती जिवंत असेपर्यंतच असतं का? बायको मेली की तिचं नावही पुसून टाकायचं आयुष्यातून?…मला काही झालं तर विवेकही असंच करेल का? पूजा या विचारांनी इतकी दु:खी झाली, भांबावली की पटकन सोफ्यावर बसली. दोन्ही हातांनी तिनं डोकं दाबून धरलं. सगळं घर फिरतंय असं तिला वाटलं.

विवेकनं तिला आधार दिला. ‘‘काय झालं पूजा? काय होतंय?’’ त्यांने तिला प्रेमळ शब्दात विचारलं.

पूजानं उत्तर दिलं नाही…‘‘तुला धक्का बसलाय का? शांत हो बरं! अगं, तुला काही झालं तर माझ्याकडे कोण बघणार?’’ त्यांनी तिला जवळ घेत, समजूत घालत म्हटलं.

एरवी विवेकच्या या शब्दांनी सुखावणारी पूजा एकदम तडकून ओरडली, ‘‘तर मग तुम्हीही या आकाशसारखी दुसरी बायको घेऊन या. सगळे पुरूष मेले असेच दुटप्पी अन् स्वार्थी असतात.’’

तिला थोपटून शांत करत अत्यंत संयमानं विवेकनं म्हटलं, ‘‘तू उगीच डोक्यात राख घालून स्वत:चं बी.पी. वाढवू नकोस. आकाशला सलोनीच्या आईवडिलांनीच आग्रह केला आहे, कारण आकाशला ते आपला मुलगाच मानतात ना? त्याचं एकटेपणाचं दु:ख बघवत नाहीए त्यांना. शिवाय लहानग्या शौर्यलाही आईची माया हवीय ना? त्यांनीच समजावून सांगितलं की तू लग्न कर. तुझ्या पत्नीच्या रूपात आम्हाला आमची मुलगी मिळेल. त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या पुतणीशी त्याचं लग्न जुळवलं आहे.’’

एव्हाना पूजा थोडी सावरली होती. विवेकनं तिला पाणी प्यायला दिलं. पुन्हा त्याच स्निग्ध, शांत आवाजात तो बोलू लागला, ‘‘पूजा आयुष्य म्हणजे केवळ आठवणी आणि भावना नसतात. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. प्रसंगी भावनांना मुरड घालावी लागते. वास्तवाला सामोरं जावं लागतं. दु:ख विसरून भविष्याकडे वाटचाल करणं याला ‘जीवन ऐसे नाव.’’’

‘‘पण त्याचं सलोनीवर…’’

‘‘प्रेम होतंच. अजूनही आहेच. ते कायमच असेल. दुसरं लग्न करतोय म्हणजे सलोनीला विसरला असं नाहीए. पण सलोनी आता परत येणार नाही, पण या पत्नीत तो आता सलोनीला बघेल. ही त्याची सलोनीला अत्यंत सार्थ आणि व्यावहारिक श्रद्धांजली आहे.’’

‘‘हे लग्न म्हणजे स्त्री आणि पुरूष एकमेकांचे पूरक असल्याचा पुरावा आहे. संसार रथासाठी दोन्ही चाकं लागतात. आकाशच्या संसाराचा रथ जेवढ्या लवकर मार्गावर येईल तेवढं चांगलं ना?’’

आता मात्र पूजाला आपल्या खोट्या विचारांची लाज वाटली. विवेकनं किती  शांतपणे अन् डोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न डोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न करतोय यात अयोग्य, अनुचित काय आहे? त्याच्या प्रेमाला बेगडी ठरवण्याचा अधिकार तिला कुणी दिला?

पूजानं विवेकचा चहा आटोपला…रात्रीचा स्वयंपाक व जेवण झाल्यावर ती म्हणाली, ‘‘उद्या लग्नाला जाताना काय कपडे घालायचे ते आत्ताच ठरवूयात. म्हणजे सकाळी घाई होणार नाही. लग्नाला जायचं म्हणजे व्यवस्थित जायला हवं ना?’’

विवेकनं हसून मान डोलावली.

परिणाम

कथा * भावना प्रराते

गोष्ट खरी आहे. शंभर टक्के सत्य आहे याचे पुरावे मिळाल्यानंतर सोनी प्रथम स्तब्ध झाली. बधिर होऊन बसून राहिली. काळ जणू थबकला होता. वाराही वाहायचा थांबला होता. पण थोड्याच वेळाने ती भानावर आली. एकदा आधी रोहनलाच विचारायला हवं. तिला मनांत वाटलं. तो म्हणेल हे सगळं खोटं आहे. कदाचित सोनीनं त्याच्यावर संशय घेतला म्हणून तो संतापेल, रागवेल, अबोला धरेल. मग त्याला कसं समजवायचं, क्षमा मागायची, त्याचा रागरूसवा कसा घालवायचा याचीही उजळणी तिच्या वेड्या मनात करून टाकली. पण तसं घडलंच नाही. रोहननं सत्य स्वीकारलंच. अगदी नि:संकोचपणे, खरंतर निर्लज्जपणे. सोनीला वाटलं आत्तापर्यंत ज्या घराला, संसाराला आपलं सर्वस्व समजत होती तो फक्त काचेचा शोपीस होता. वाऱ्याचा झोत आला अन् तो फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले. ते विखुरलेले काचेचे तुकडे अन् कण वेचताना मन रक्तबंबाळ झालं.

त्यांच्या लग्नाला दहा वर्षं झाली होती. अन् हे पहिलं भांडण त्यांच्यात झालं. नको असलेलं एखादं पृष्ठ अवचित उघडावं अन् कॉम्प्यूटर हँग व्हावा असं काहीसं झालं. रोहनची वाक्य तिच्या मनावर खोलवर आघात करून गेली. रडता रडता ती त्याला दुषणं देत होती. त्याला नको नको ते बोलत होती. रोहन अगदी शांतपणे ऐकून घेत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण सोनी आता ऐकणार नव्हती. तशी ती काही गरीब गाय किंवा बिच्चारी वगैरे नव्हती. चांगल्या सुधारक घरातली, सुबत्तेत वाढलेली, भरपूर शिकलेली मुलगी होती. कमवत नाही तर काय झालं? कमवू शकेल इतकं शिक्षण, इतकी योग्यता आहे तिच्याकडे. अशी कशी सवत उरावर नांदवून घेईल? एक महिना दोघांमधलं शीतयुद्ध चालू होतं. शेवटी ही कोंडी फोडायलाच हवी म्हणून निर्धारानं तिनं सांगितलं, ‘‘तुम्हाला त्यांना सोडावंच लागेल.’’

‘‘अन् ते शक्य नसेल तर?’’ रोहननं शांतपणे विचारलं.

‘‘तर मला वेगळं व्हावं लागेल. सोडू शकत नसाल तर मला…’’ अनेक दिवसांपासून सोनीनं हा संवाद पाठ करून ठेवला होता. वेळ आली की ऐकवायचाच म्हणून. आत्ता मात्र हे बोलताना तिचे डोळे भरून आले.

रोहनला तेवढ्यात तिला भावनिक बनवून गुंडाल्ल्याची संधी मिळाली. ‘‘असं कसं सोडेन तुला? तुझ्यावर प्रेम आहेच माझं. अन् एकाच वेळी अनेकांवर प्रेम करणं शक्य आहे माणसाला. आईबाप नाही का दोन मुलांवर सारखंच प्रेम करतात?’’

‘‘दोघींपैकी एक हीच तर अडचण होती ना? तुला ऐकायचं असेल तर नीट बैस. मी कॉफी करून आणतो. त्याबरोबर तुला आवडणाऱ्या कुकीजही आणतो.’’

सोनीचा संताप आता अनावर झाला. तिनं रोहनकडे एकदा आग ओकणाऱ्या डोळ्यांनी बघितलं अन् सरळ तोंड फिरवलं. ‘‘एखाद्या मनोरंजक सिनेमाची गोष्ट ऐकल्याप्रमाणे मी हे सगळं ऐकून घेईन असं वाटलंच कसं तुम्हाला?’’ तिनं तिरस्कारानं विचारलं.

पण रोहननं तरीही कॉफी करून आणलीच! तो सांगू लागला, ‘‘आम्ही तिघं कॉलेजात एकत्र होतो. एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो. जेव्हा त्यांना दोघींना समजलं की त्या दोघीही माझ्यावर प्रेम करताहेत तेव्हा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला. मी स्वत:च्या मनाचा कौल घेतला तेव्हा मलाही एकूण परिस्थिती बरीच अवघड असल्याचं जाणवलं. मला दोघीही सारख्याच आवडत होत्या. मी त्यांना तसं सांगितलं. शेवटी निर्णय असा झाला की आता सगळं परिस्थितीवरच सोपवावं. मी माद्ब्रया वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यांचा एवढा छान बिद्ब्रानेस. मला घर सोडून जायचं नव्हतं. मी इथंच धंदा सांभाळणार होतो. आता योगायोग असा की रीता मुंबईला अन् सारा बंगलोरला स्थायिक द्ब्राली. या दोन्ही ठिकाणी?धंद्याच्या निमित्तानं मला बरेचदा जावं लागतं. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या शहरात जातो तेव्हा आम्ही मित्रत्त्वाच्या नात्यानं भेटतोच. मग गप्प्पा, भटकणं, विचारांची देवाणघेवाण, वादविवाद, खाणंपिणं…सगळंच होतं. त्यात एक दिवस…’’

रोहननं कॉफीचा कप सोनीपुढे धरला. विचारलं, ‘‘पुढे सांगू?’’ कॉफीचा कप दूर सारत सोनीनं होकारार्थी मान डोलावली.

‘‘एकदा माझ्या नेहमीच्या हॉटेलमध्ये रिनोव्हेशन चालू असल्यानं माझी राहण्याची पंचाईत झाली. रीताला हे कळलं तेव्हा ती मला तिच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेली. वाटेत जोराचा पाऊस लागला. आम्ही दोघंही चिंब भिजलो होतो. गारठलो होतो. कारण रीताची गाडी वाटेत बंद पडली होती अन् टॅक्सी मिळत नव्हती. शेवटी एकदाचे तिच्या घरी पोहोचलो. गरमागरम कॉफी घेत गप्पा मारता मारता आमची मैत्री दैहिक पातळीवर कशी अन् केव्हा पोहोचली ते आम्हाला कळलंच नाही. मैत्रीची मर्यादा ओलांडली गेली हे खरं.

आम्ही तिघंही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून कधीच लपवत नाही. साराला जेव्हा हे समजलं, तेव्हा तिला वाटलं की मी आता रीताशी लग्न करून तिच्याशी कायमचे संबंध तोडीन. ती त्यादिवशी फारच उदास होती. सारखी रडत होती. मी तिला समजवत होतो. ‘‘तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना तर मलाही असह्य होती. तिची समजूत घालता घालता मग केव्हा आम्ही एकमेकांच्या…’’

‘‘पुरे करा! ऐकवत नाहीए मला,’’ सोनीचा संताप उफाळून आला. हे सगळं होतं तर माझ्याशी लग्न करून तुम्ही माझ्या आयुष्याचं का वाटोळं केलंत?

‘‘मला खरं तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. पण आई बाबांच्या हट्टापुढे मला नमावं लागलं. मी तुला बघायला गेलो नाही तर ‘विष खाऊन जीव देईन’ अशी धमकी दिली होती आईनं मला. असंही वर म्हणाली होती की मुलगी आवडली नाही तर नकार दे म्हणून. पण तुला बघितल्यावर नकार देणं शक्य तरी होतं का? तू आयुष्यात येणं हे तर कोणत्याही पुरुषाचं भाग्यच ठरलं असतं.’’

हीच गोष्ट अत्यंत रोमँटिक पद्धतीनं रोहननं तिला आधीही सांगितली होती अन् प्रत्येक वेळी सोनी आनंदानं अन् अभिमानानं फुलून आली होती. आज मात्र कुत्सितपणे तो बोलली, ‘‘मला बघून तुम्हाला वाटलं असेल, बरी आहे घरगुती मुलगी. दिसायला तरुण अन् सुंदर आहे. आईवडिलांची सेवा करेल, घर सांभाळेल, नातलगांचं आदरातिथ्य करेल, पोरांना जन्माला घालेल, त्यांना सुसंस्कृत बनवेल. तुम्ही तृप्त, तुमचं कुटुंब, घरदार संतुष्ट! असं प्रकरण समजा तिला कळलंच तर ती जास्तीत जास्त काय करेल? रडेल, भेकेल अन् गप्प बसेल.’’ डोळ्यातले अश्रू पुसून सोनीनं निश्चयी सुरात रोहनना ऐकवलं. ‘‘पण मी इतकी गरीब बिच्चारीही नाहीए. मी पूर्णपणे तुम्हाला समर्पित होते अन् आहे. प्रेम मी फक्त तुमच्यावर अन् तुमच्यावरच केलंय. त्यामुळेच तुम्ही पूर्णपणे माझे असाल नाही तर…’’ आवाज पुन्हा घशात अडकला…पुढे बोलवेना.

रोहनच्या अनुभवी वक्तृत्वानं पुन्हा सूत्रं हातात घेतली. ‘‘ठीक आहे. तुझी इच्छा असेल तर तसंच होईल. चूक माझी आहे, तेव्हा सहनही मीच करायला हवं. तुला जे हवं ते तुला मिळेल. पोटगी, मुलांची कस्टडी…पण…’’ रोहननं वाक्य अपूर्ण ठेवलं. काही क्षण तो गप्प राहिला मग एक उसासा सोडून म्हणाला, ‘‘तू अजून घराबाहेर पडली नाहीस, त्यामुळे एकट्या स्त्रीला काय सोसावं, भोगावं लागतं याची कल्पना नाहीए तुला. उपाशी लांडगे लचके तोडतात बाहेरच्या जगात. रीता अन् सारासारख्या स्वावलंबी, हुशार, कर्तबगार स्त्रियांनासुद्धा भावनिक आधाराची गरज पडते. लाखो रुपये कमावतात त्या. पण त्या घरकाम स्वत:च करतात. कारण एकट्या स्त्रीला घरात नोकर ठेवणंही धोक्याचं वाटतं. शिवाय प्रश्न आपल्या मुलांचा आहे. त्यांना आपल्या दोघांची सवय आहे. दोघांपैकी एकाचबरोबर ती राहू शकतील का? त्यांच्यावर किती परिणाम होईल याचा विचार केला आहेस का?’’

मुलांचा मुद्दा निघताच सोनी एकदम दचकली. जणू झेपेतून खडबडून जागी झाली. आत्तापर्यंत तिनं फक्त कस्टडीचा विचार केला होता. दोघांपैकी एकाशिवाय राहणं मुलांना मानसिक, भावनिकदृष्ट्या पेलवेल का? याचा तर तिनं विचारच केला नव्हता. क्षणभर ती बावरली, पण लगेच सावरून म्हणाली, ‘‘तुम्ही मला धमकी देताय?’’

‘‘नाही, जे आयुष्य तू जगू बघते आहेस, त्याचे परिणाम सांगतोय. का उगीच मोडते आहेस इतका चांगला मांडलेला संसार?’’ रोहननं काळजाला हात घालत विचारलं.

एकटीनं बसून तिनं काल घडलेल्या गोष्टींचा विचार केला. एकूण परिणाम काय झाला? तिच्या लक्षात आलं की रोहनच्या आवाजात नम्रता होती, सहानुभूती होती, प्रेमही होतं. पण घडलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप नव्हता. स्वत:ची चूक घडलीय हे त्याला मान्य नव्हतं. त्यानं एकदाही क्षमा मागितली नाही. तो जे करतोय, ते केवळ अनैतिकच नाही तर पाप आणि गुन्हा आहे हे त्याला सोनी समजावू शकली नव्हती. बायको असाध्य रोगानं अंथरूणाला खिळली असेल किंवा शरीरसुख द्यायला असमर्थ असेल तर दुसऱ्या स्त्रीशी संबंध एकवेळ समजू शकतो. पण तसं काहीच नव्हतं. खरं तर तिनं ठरवलं होतं की रोहनला स्पष्टच विचारेल ‘इतकी साधी सोपी गोष्ट होती तर लग्नाच्या आधीच का सांगितलं नाहीस?’ पण हे ती बोलूच शकली नाही उलट रोहननंच चतुराईने तिला सांगून टाकलं की तो तिलाही सोडणार नाहीए. संसार मोडला तर जबाबदार सोनी असणार आहे. तो तिला पैसा अडका देऊन स्वत:ला मोकळंच ठेवेल अन् संसार मोडला नाही तर जे चाललंय त्यासाठी सोनीची स्वीकृती आहे असंच मानलं जाईल.

म्हणजे आत्तापर्यंत जे लपूनछपून चाललं होतं ते आता राजरोस चालेल? तिचं डोकं भणभणू लागलं. रोहननं बॉल तिच्या कोर्टात टाकला होता. आता जे करायचं ते तिनेच करायला हवंय. तिनं एक दिर्घ श्वास घेतला. अजून प्रश्नाची तड नाही लागली हे खरं असलं तरी वस्तुस्थिती स्पष्ट आहे. बोलून रडून मनही मोकळं झालंय. आता ती शांतपणे आपली स्टे्रटेजी ठरवू शकते. काय केलं की काय होईल याचा एक ढोबळ आराखडा तिनं मनांत तयार केला. दुखणं अवघड जागेचं होतं त्यामुळे शस्त्रक्रिया फार काळजीपूर्वक व्हायला हवी. यशाची खात्री काही टक्केच असली तरी प्रयत्न करायलाच हवा. गाजराची पुंगी म्हणा…वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. पण प्रयत्न न करता, लढाई न लढताच पराजय स्वीकारण्यापेक्षा लढणं केव्हाही चांगलंच.

दुसऱ्या दिवशी सकाळी सोनी खूपच लवकर उठली. स्वत:चं सगळं आवरून मुलांच्या बरोबरच तीसुद्धा तयार होती. सकाळी सात वाजता टॅ्रकसूटमध्ये बघून आपापला पेपर उघडून खुर्च्यांवर वाचत बसलेल्या रोहननं अन् बाबांनी आश्चर्यानं अन् प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं.

‘‘त्याचं काय आहे बाबा,’’ अत्यंत नम्रपणे अन् आवाजात मध, खडीसाखर घोळवून सोनीनं म्हटलं, ‘‘मुलांच्या बसस्टॉप समोरच एक अतिशय प्रसिद्ध लेडीज जिम आहे. मला फार वाटायचं की आपणही तिथं जावं. आता तर तिथं ५० टक्के डिस्काऊंट आणि ब्यूटी ट्रीटमेंटचं संपूर्ण पॅकेज ऑफर करताहेत. त्यामुळे मला फारच मोह झाला. आज आळशीपणाला शह देत मी माझं आवरू शकले. आता मुलांना बसमध्ये बसवून मी जरा जिमला जाऊन येईन.’’

‘‘आणि आमचा चहा…नाश्ता?’’ रोहननं घाबरून विचारलं.

‘‘प्लीज, तेवढं तुम्ही बघाल ना? मला फार मदत होईल.’’ नम्रता अन् मध खडीसाखर ओसंडून चालली होती. मुलांना घेऊन सोनी निघून गेली. रोहननं वडिलांकडे बघितलं. दहा वर्षांत पहिल्यांदाच सोनी साडीऐवजी टीशर्ट टॅ्कपॅण्टमध्ये त्यांच्यासमोर आली होती आणि असं काही बोलली होती. त्यांना फारच आश्चर्य वाटलं होतं…ते नाराजही होते का? रोहननं काही न बोलता स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला.

रात्री दहा वाजता बेडरूममध्येच भेट झाली तेव्हा बोलायची संधी मिळाली. रोहन काही बोलणार त्यापूर्वीच सोनीनं कॉफीचा कप त्याच्यापुढे धरला, ‘‘जरा आरामात बसून बोलूयात?’’ तिनं विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता म्हणाली, ‘‘मी आज सायंकाळी कुठं गेले होते हेच विचारायचं आहे ना तुम्हाला? हे अन् रोजच असं कसं चालेल? खरं ना?’’ मग प्रेमानं नवऱ्याचा हात हातात घेत ती म्हणाली, ‘‘लग्नाला दहा वर्षं झालीत. एवढ्या वर्षांत माझ्या समर्पणात काही उणीव जाणवली तुम्हाला? माझ्या मनावर जो आघात झाला आहे तो सहन करणं ही साधीसुधी गोष्ट नाही हे तर तुम्हीही मान्य कराल. कधीतरी तुमच्या मनांत आलं. तेव्हा मी बंगलोर आणि मुंबईला जाण्यासाठी तुमची बॅग भरेन तेव्हा माझ्या मनाला किती यातना होतील?

‘‘पण तेवढ्यानं भागणार नाही. मेंदू अन् मन शांत रहायला हवं म्हणूनच मी संध्याकाळी योगासन आणि प्राणायामचा क्लास सुरू केला आहे. दुपारी एक दोन कोर्सेस अन् रात्री सोसायटीच्या सोशल वर्क कमिटीसाठी वेळ ठरवला आहे. कारण स्वत:ला असं गुंतवून घेतलं नाही तर रिकामा वेळ मला सतत तुमच्या त्या…’’ वाक्य पूर्ण न करताच ती हुंदके देऊ लागली. मग थोडी सावरून पुढे म्हणाली, ‘‘मला तुमची मदत हवीए. थोडा मानसिक आधार आणि सहकार्य हवंय. मला स्वत:ला थोडं पक्कं व्हायचंय. सेल्फ डिपेंडंट व्हायचंय. म्हणजे मला…कसं सांगू तुम्हाला…म्हणजे मी गरीब बिच्चारी, असहाय्य आहे म्हणून प्रेमात वाटेकरी सहन करते आहे, ही भावना मला नकोय, तर माझं तुमच्यावर अलोट प्रेम आहे, त्या प्रेमापोटी मी तुमच्या प्रेमात वाटेकरी सहन करतेय असं मला जाणवलं पाहिजे…तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते?’’

‘‘ठीक आहे.’’ तिच्या हातावर थोपटत रोहननं म्हटलं, ‘‘मी प्रयत्न करतो.’’ सोनीच्या प्लॅनिंगचं पहिलं पाऊल तर यशस्वी ठरलं होतं.

सोनीचा रोजचा दिनक्रम ठरला होता. सकाळी सातला मुलांबरोबर बाहेर पडायचं. दुपारी त्यांना घेऊन घरी जायचं. त्यांचं व स्वत:चं जेवण आटोपून मुलांचा अभ्यास, होमवर्क पूर्ण करून घ्यायचा. मग सायंकाळी योगासनच्या वर्गाला जाताना त्यांना खेळायच्या मैदानावर सोडायचं. खेळून, पोहून मुलं दमून आल्यावर त्यांना खायला घालायचं. मग थोडा वेळ मुलं टीव्ही बघत बसायची तेवढ्या वेळात सोनीकडे गरीब मुलं शिकायला, ट्यूशनला यायची.

सोनीची नणंद अनन्या गावातच दिलेली होती. सोनीचे आणि तिचे संबंध खूपच प्रेमाचे अन् मैत्रीचे होते. ती नोकरी करायची. त्यामुळे तिच्या मुलांना ती आजोळी म्हणजे सोनीकडेच सोडायची. आजी आजोबा मुलांना थोडा वेळ द्यायचे पण दिवसभर त्यांचं खाणंपिणं, कपडे बदलणे, खेळायला नेणं वगैरे सर्व सोनी करायची. घरात कामासाठी मोलकरीण होती. स्वयंपाकघर मात्र पूर्णपणे सोनी बघायची. मुलांना नेणं, आणणं वगैरे सोनीच सांभाळायची कारण ती उत्तम गाडी चालवायची.

पूर्णवेळ घरात राहून संपूर्ण घर व्यवस्थितपणे सांभाळणारी सोनी जेव्हा दिवसभर घराबाहेर राहू लागली तेव्हा घरात गडबड, गोंधळ, अव्यवस्था हे सर्व होणारच होतं. स्वयंपाकाला आता बाई ठेवली गेली होती. तिच्या हातचा बेचव स्वयंपाक आणि स्वत:चं चहापाणी, ब्रेकफास्ट वगैरे बघावं लागत असल्यानं आईबाबाही चिडचिडे झाले होते. सोनीचं वागणं, तिचं घराकडे दुर्लक्ष करणं यामुळे घरातला ताणतणाव वाढला होता. रोहनच्या संतापावर सोनीनं अश्रूरूपी पाणी ओतून आपली बाजू बळकट केली होती.

आज रविवार होता. सोनी अन् मुलं सकाळीच आवरून कुठंतरी निघून गेली होती. अनन्या व जावईबापू जेवायला येणार होती अन् स्वयंपाकघरात चार चांगले पदार्थ करताना आईची दमछाक झाली होती. त्यातच सोनीनं अनन्याच्या मुलांना दुपारी पाळणाघरात ठेवण्याचा विषय काढून आगीत तेल ओतलं होतं.

रात्री दहा वाजता सोनी घरी आली, तेव्हा बॉम्बस्फोट होणार हे नक्की होतं. मुलांना सोनीनं खोलीत जायला सांगितलं. रोहन श्वास रोखून वाट बघत होता. सासू-सुनेच्या भांडणात कुणाला न्याय देता येतो याचा विचार करत होता.

सोनीनं सरळ खुर्चीवर बसलेल्या सासूच्या पायाशी बसकण मारली अन् त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडू लागली. ‘‘आई, तुम्हाला काय सांगू? हल्ली हे माझ्याशी फार वाईट वागतात. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या स्मार्ट स्त्री सहकाऱ्यांशी माझी तुलना करतात. म्हणतात त्या एकट्यानं सगळं मॅनेज करतात आणि तुला काहीही करता येत नाही. त्यांची सारा नावाची मैत्रीण व सहकारी कमालीची फिगर कॉन्शस आहे तर रीतू सुंदर आणि स्मार्ट आहे. हे म्हणतात, त्यांच्याकडून शिक काहीतरी. मी तर एक घरगुती स्त्री. फक्त गृहिणी, सून, आई, मामी, भावजय, पण ठरले शेवटी गांवढळच! मला सांगा आई, मला या सगळ्या गोष्टींचं किती दु:ख झालं असेल?’’ रडून रडून सोनीनं सासूचा पदर ओला करून टाकला. सासू बिचारी तिच्या हुंदक्यांनी, डोळ्यातल्या पाण्यांनं आणि बोलण्यानं विरघळली होती. ‘‘म्हणून मी स्वत:ला त्यांच्यासारखं करायचा प्रयत्न करतेय. आई, माझ्या मनांत एक कल्पना आली आहे.’’

सोनीनं आईच्या वर्मावरच बोट ठेवलं. आईची कधीपासून इच्छा होती असं काही तरी करायची पण सोनीनं फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. म्हणताना त्यांनीही नाद सोडला होता. बाबा पक्के व्यापारी होते. काही चांगलं काम करून पैसा घरात येणार असेल तर त्यांची हरकत नव्हतीच. सोनीनं सासूशी भांडणही केलं नाही. रोहनची गैरवर्तणूक लपवून त्याच्यावर उपकारच केले होते. दुसरी स्टेपही यशस्वी झाली होती.

ऑक्टोबर महिन्यात भरपूर गरम झालं होतं. हवेतला असा बदल रोहनला नेहमीच त्रासदायक ठरायचा. त्याचा दमा अन् खोकला उफाळून यायचा. बिघडलेली तब्येत रूळावर यायला फार वेळ लागयचा.

सोनीनं शोधाशोध करून, गल्ल्याबोळ फिरून एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून औषध मिळवलं होतं. त्या औषधामुळे गेली कित्येक वर्षं रोहनला खोकल्याचा, दम्याचा त्रास झाला नव्हता. वैद्यांनी दिलेली पाल्याची, मुळ्यांची औषधं सोनी स्वत: पाट्यावर वाटून मधातून सकाळसंध्याकाळ रोहनला देत असे. वेडीवाकडी तोंडं करत रोहन ती औषधं घ्यायचा. यावेळी सोनीनं वैद्यांकडून औषधं आणली नाहीत. वाटून, पूड करून रोहनला खाऊ घातली नाहीत. व्हायचं तेच झालं.

रोहनचा खोकला आटोक्यातच येईना. आठ दिवस खोकून खोकून तो थकून गेला. त्यात तीन दिवस तापही येत होता. डॉक्टरांची औषधं लागू पडत नव्हती. तोंडाची चव गेलेली…त्यात स्वयंपाकवाल्या बाईंच्या हातचा बेचव स्वयंपाक. रोहन वैतागला होता. संतापला होता. कारण सोनी त्याच्याकडे फिरकतच नव्हती. एकेकाळी त्याचं साधं डोकं दुखलं तर ती त्याच्याजवळून हलायची नाही आणि आता तापात होता तरी कपाळावर पाण्याच्या पट्टया आईच ठेवत होती. सोनीची दिनचर्या अजिबात बदलली नव्हती. त्याचा ताप उतरला आणि दोन दिवसातच बाबांना ताप आला. सोनी शांतपणे नव्या दिनक्रमात व्यग्र होती. आता मात्र रोहनचा संयम संपला. आता बोलायलाच हवं.

‘‘आता अधिक स्वातंत्र्य मिळणार नाही. बंद कर हा सगळा तमाशा.’’ रोहनच्या आवाजात हुकूमत आणि संतापही होता.

‘‘अन् ते नाही झालं तर?’’ नम्र सुरात, अत्यंत थंडपणे सोनीनं विचारलं.

‘‘नाही झालं तरचा अर्थ काय? नवरा आहे मी. कळतंय का तुला? नवरा म्हणून कर्तव्यात मी कसूर केली नाही. घर आहे की धर्मशाळा? तू जे करत आलीस ती तुझी जबाबदारीच होती ना?’’ अनावर संतापानं तो बोलत होता पण प्रश्न विचारला गेला आणि सोनीला बोलायची संधी मिळाली.

‘‘नाही, नाही…म्हणजे मला तसं काहीच म्हणायचं नाहीए…पण…’’ सोनी प्रेमानं बोलत होती पण वाक्य मुद्दामच अर्धवट सोडलं तिनं. मग काही क्षणानंतर म्हणाली, ‘‘ऐकायचंय मला काय म्हणायचं ते? असं करा, आरामात बसूनच बोलूयात. मी कॉफी करून आणते आणि तुमची आवडती बिस्किटंही आणते त्याच्या सोबत.’’ ती हसत उठली अन् कॉफी करायला गेली.

कॉफीचा कप त्याच्या हातात देत ती म्हणाली, ‘‘हा मनुष्य स्वभावच आहे…माणूस जे देतो त्याची आठवण तो नेहमीच ठेवतो, पण त्याला जे मिळतं त्याची त्याला आठवणही राहात नाही. तुम्ही मला एक चांगलं कुटुंब दिलंत. पुन्हा पुन्हा तुम्ही ते बोलून दाखवलंत, पण ते कुटुंब तृप्त, सुखी, संतुष्ट, निरोगी, आनंदी रहावं म्हणून मी किती कष्ट घेतले ते तुम्ही सोयीस्करपणे विसरलात…’’

‘‘पण मी असं कधी म्हणालो की तू घराच्या सुखासाठी कष्ट घेतले नाहीस म्हणून? तुझा स्वाभिमान मी कधी दुखावला?’’ रोहन अजूनही रागातच होता.

त्याच्या डोळ्यांत बघत, त्याचे हात हातात घेत सोनी म्हणाली, ‘‘मी घटस्फोट घेतला तर मला हवं ते तुम्ही द्याल हे किती सहजपणे बोललात तुम्ही रोहन? काय देणार होतात तुम्ही मला? आयुष्याची ही दहा वर्षं जी केवळ मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठीच जगले. कुटुंबाचा कणा होताना स्वत:चं अस्तित्त्वच उरलं नाही. ती दहा वर्षं आता फक्त माझ्या स्वत:च्या जगण्यासाठी तुम्ही मला परत करू शकाल? मी तुमच्यावर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करते रोहन. लग्न झाल्यादिवसापासून माझे आयुष्य फक्त तुमच्याभोवती फिरतंय. दिवस तुमच्यापासून सुरू होतो, तुमच्यापाशी संपतो. मुलांची कस्टडी आणि काही रुपये माझ्या दहा वर्षांच्या तपश्चर्येचं कॉम्पेनसेशन असू शकतं,?’’ सोनीनं रडत रोहनला मिठी मारली.

पण रोहन इतकं भावनाविवश झाला नाही. सोनीची मिठी सोडवून घेत तो म्हणाला, ‘‘एक मिनिट, तू इथं बैस. तू गोष्टी उलट्यापालट्या करून ओव्हर रिएक्ट होते आहेस. तुला सारा आणि रीता नकोशा का वाटतात? तू त्यांना एक्सेप्ट का करू शकत नाहीस? मी काय प्रॉपटी दिलीय त्यांना? माझ्या कोणत्याही संपत्तीवर त्यांचा कुठलाही लीगल राइट नाहीए. आता त्यांच्या घराच्या आसपासचे, सोसायटीतले लोक मला त्यांचा नवरा म्हणून ओळखतात ते सोड. पण त्यांनीही कधी लिमिट क्रॉस केली नाही आणि घटस्फोट देण्याची गोष्ट मी बोललो नव्हतो. मी तर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण करणारच होतो. मी तुम्हा तिघींपैकी कुणालाच सोडू इच्छित नाही. मला तुम्ही तिघी हव्या आहात.’’

सोनी तुच्छतेनं हसली आणि बोलली, ‘‘तिघींपैकी कुणालाही? फॉर युअर काइंड इनफरमेशन…, तुम्ही जेव्हा त्यांच्या शहरात जाता तेव्हा तुमची कपड्यांची बॅग मी भरते. जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा मळके, चुरगळलेले कपड्यांचे बोळे निघतात बॅगेतून. त्या तुमचे कपडे धुवत नाहीत. कारण त्या तुम्हाला त्यांची जबाबदारी किंवा बांधीलकी मानत नाहीत. एकदा मुंबईची फ्लाइट कॅन्सल केली तुम्ही कारण तुम्हाला ताप आला होता. कारण आजारपण निस्तरणं, सेवा करणं त्यांना जमणार नव्हतं. तुमच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नो ड्यूटीज, नो राइट्सच्या व्यवहारी प्रेमात माझ्या एकनिष्ठ प्रेमाला, कर्तव्यनिष्ठेला एकाच तागडीत तोलताय तुम्ही? त्यांच्यापासून काही लपवलं नाही, त्यांना सोडणार नाही इतकं कोरडेपणाने सांगून टाकलंत? आणि जिच्यापासून आयुष्यातली घोडचूक लपवलीत तिला सोडायला तयार झालात? त्या दोघी तुमचं प्रेम वाटून घेत असतील कारण तेवढं प्रेमही त्या तुमच्यावर करत नाहीत. जो बंधन स्वीकारतो तोच बांधू शकतो. त्यांना बंधन नकोय म्हणूनच त्या जबाबदारीही घ्यायला तयार नाहीत.’’

प्रेम ‘मी’ केलंय तुमच्यावर. यावेळी औषध दिलं नाही तुम्हाला. तुमचा दमा, खोकला, ताप, सगळं बघत ऐकत होते. किती रडले मी त्या काळात. तुमच्या खोकल्यानं माझा श्वास कोंडत होता.

बोलता बोलता सोनीचा कंठ दाटून आला. ‘‘मग मीही विचार केला की उगीचच घटस्फोट घेण्यात अर्थ नाही. मांडलेला संसार फुकाफुकी मोडायचा कशाला? चूक तुमची आहे, मी का म्हणून शिक्षा भोगू? सारा अन् रिता स्वत:च्या आयुष्याच्या स्वत: निर्मात्या आहेत. माझे आयुष्य तुमच्याभोवतीच फिरतंय. तुमची आवड, तुमचा आनंद, तुमचं कुटुंब, तुमचं समाधान म्हणजे तुम्ही अन् फक्त तुम्हीच! स्वत:चं असं काहीच माझ्या आयुष्यात उरलं नाहीए. इतकी मी तुमच्यात विरघळून गेले आहे. पण जेव्हा लक्षात आलं की तिघी तुमच्या दृष्टीनं सारख्याच आहेत. तेव्हा मी विचार केला आपणही तुमच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून बघूयात. नो ड्यूटीज, नो राइट्स! काही दिवसांसाठी मीही स्वत:चं आयुष्य स्वत:च्या कर्तबगारीवर, स्वत:च्या मर्जीनं जगून बघतेय. माझी आवड, माझी तृप्ती म्हणजे फक्त मी अन् मीच! फेसबुकवर शाळा कॉलेजातल्या मित्रमैत्रीणींचे ग्रुप मला मोहात पाडत होते. मी त्यांना जॉइन झाले आहे. उद्या त्यांच्यापैकी कुणाबरोबर माझे संबंध अधिक निकटचे झाले अन् ते तुम्हाला कळलं तर तुम्ही ओव्हररिएक्ट कराल की नाही ते मी ही बघेन!’’

रोहनचा चेहरा रागानं लाल झाला, ‘‘म्हणजे, तू मला…’’

‘‘माझं बोलणं अजून संपलं नाहीए.’’ रोहनला पूर्ण बोलू न देता तिनं म्हटलं, ‘‘आणि कुठे? दोघांपैकी केवळ एकासोबत राहणं त्यांना त्रासदायक होईल हे तुम्हीच ठरवून टाकलंत. पण खरी गोष्ट त्यांना समजली, तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार नाही केलात? आईवडिल मुलांचे रोल मॉडेल असतात. त्यांच्या त्या कल्पनेला धक्का लागला तर दोन गोष्टी घडतात. एक तर मुलं फ्रस्टे्रट होतात, डिप्रेस होतात नाही तर त्यांच्याच प्रमाणे वागू लागतात. तुमची करिअर माइंडेड मुलगी उद्या तुम्हाला म्हणाली की आईच्या आयुष्यापेक्षा मला स्वतंत्र, स्वावलंबी अन् मुक्त असं सारा किंवा रिताचं आयुष्यच आवडतं…मी नोकरी करेन पण लग्न न करता अमक्यातमक्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहीन तर तुम्हाला ते झेपेल का? किंवा तुमचा मुलगा सून न आणता…’’

रोहन खरोखर हादरला. हा विचार त्याच्या मनात आलाच नव्हता. फक्त आपलं निरपराधित्त्व सिद्ध करण्याच्या नादात तो हा पैलू विसरलाच होता. तरी त्याने संतापून विचारलं, ‘‘मला धमकी देते आहेस?’’

‘‘नाही. अजिबात नाही. फक्त जे आयुष्य तुम्ही जगताय त्याचे परिणाम सांगतेय. मी तुम्हाला विनवते आहे, आपला सुखाचा संसार उगाच अट्टहासापायी मोडू नका. जे घडलं ते तिथंच सोडायची तयारी असेल तर मी ही सर्व विसरायला तयार आहे. कारण माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा…सगळ्यात तुम्हीच आहात. मी तुमच्याहून वेगळी नाहीए. पण…जर त्यांना सोडणं तुम्हाला जमणार नसेल तर संसार मीही मोडणार नाही, पण उगीचच त्याला ठिगळं लावत बसायला मलाही जमणार नाही. स्वतंत्रपणे जगणं मला आवडतंय, जमंतही आहे. काय?’’

रोहनच्या हातावर थोपटून सोनीनं आपलं बोलणं पूर्ण झाल्याचं सूचित केलं आणि दिवा मालवून ती शांतपणे झोपून गेली. आता बॉल रोहनच्या कोर्टात होता. निर्णय त्याला घ्यायचा होता. नेहमीची वाक्पटुता आज कामी आली नव्हती…परिणामांचं गांभीर्य लक्षात आलं होतं.

बनारसी शालू

कथा * रमणी माटेगावकर

आज सकाळीच दादाचा फोन आला, ‘‘छोटी, अगं राधा गेली…थोड्या वेळापूर्वीच तिने अखेरचा श्वास घेतला.’’ दादाचा कंठ दाटून आला होता. डोळेही अश्रू गाळत असावेत.

मी एकदम स्तब्ध झाले. कधी ना कधी दादाकडून ही बातमी मला कळणार हे मी जाणून होते. वहिनीला फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय हे दादाकडून कळल्यापासून मला धास्ती वाटत होती. मी मनोमन प्रार्थना करत होते की तिचा रोग बरा होऊन तिला काही वर्षांचं आयुष्य अजून मिळावं. पण तसं घडलं नाही. वहिनी जेमतेम चाळीशीची होती. हे वय काही मरायचं थोडीच असतं? अजून तिने आयुष्य उपभोगलंच कुठे होतं? मुलंही लहानच आहेत. हा विचार मनात येताच मला हुंदका फुटला.

मेंदू बधीर झाला होता. हातापायातली शक्ती जणू कुणी ओढून घेतली होती. पण दादाकडे जायला हवं. मी मुकाट्याने बॅग भरायला लागले. कपाटात मला पांढऱ्या मलमलच्या कापडात बांधलेला बनारसी शालू दिसला. शालू बघताच मला जुने दिवस आठवले.

वहिनीने किती हौसेने हा शालू विकत घेतला होता. एकदा दादाला ऑफिसच्या कामाने बनारसला जायचं होतं. त्याने वहिनीलाही बरोबर येण्याचा आग्रह केला. ‘‘अगं, इथून अंतर फार नाहीए. दोन दिवसांत तर आपण परतही येऊ. आई बघेल दोन दिवस मुलांना.’’

‘‘दादा, मीही येणार तुमच्याबरोबर,’’ मी हट्टाने म्हटलं.

‘‘चल, तूही चल,’’ दादाने हसून म्हटल.

आम्ही तिघंही बनारसला खूप भटकलो. वहिनी सतत माझी काळजी घेत होती. आम्ही एका खादीच्या दुकानात शिरलो. ‘‘बनारसला येऊन बनारसी शालू घ्यायचा नाही, असं कसं होईल? बघ राधा, काय आवडतंय तुला…’’ दादा म्हणाला.

वहिनीने बऱ्याच साड्या बघितल्या. तेवढ्यात तिला तो गुलाबी रंगाचा शालू दिसला. तिला तो फारच आवडला. पण त्यावरची किमतीचं लेबल बघून तिने तो पटकन् बाजूला सरकवला.

‘‘का गं? काय झालं? आवडलाय ना तो शालू? मग घे ना?’’ दादाने म्हटलं.

‘‘नको, फार महाग आहे तो…एखादी कमी किमतीची साडी बघते,’’ वहिनी म्हणाली.

‘‘किमतीची काळजी तू कशाला करतेस? पैसे मी देणार आहे,’’ म्हणत दादाने दुकानदाराला तो शालू पॅक करून द्यायला सांगितलं.

‘‘शशीसाठीही काहीतरी घेऊयात ना?’’ वहिनीने म्हटलं.

‘‘शशी अजून साड्या कुठे नेसते? तिच्यासाठी सलवार कुडत्याचं कापड घेऊयात. लग्नाला शशीलाही बनारसी शालू घ्यायचा आहे,’’ दादा म्हणाला अन् आम्ही दुकानाबाहेर पडलो.

त्या सुंदर सुंदर साड्या बघून मलाही एक साडी घेण्याची फार इच्छा झाली होती. पण दादाने माझ्यासाठी साडी घेतली नाही. मी रागावले होते. घरी आल्या आल्या मी आईकडे तक्रार केली. आईकडे तक्रार करणं म्हणजे स्फोटकांच्या कोठारात पेटती काडी टाकणं असायचं.

आई एकदम भडकली. ‘‘प्रशांत, अरे, स्वत:ची नाही, मनाची काही लाज?’’ तार सप्तकात आईचा तोफखाना सुरू झाला. ‘‘स्वत:च्या बायकोसाठी आठ हजार रुपये खर्च केले. धाकटी बहीण बरोबर होती, तिलाही एखादी साडी घेऊन दिली असती तर काय बिघडलं असतं? बिचारीचा बाप हयात नाही म्हणून तुझ्या दयेवर जगणं नशिबी आलंय.’’

‘‘आई, अगं तिच्यासाठी एवढ्यात साडी कशाला घ्यायची? ती साड्या नेसतच नाही, म्हणून तर तिला भारीतला सलवार सूट घेऊन दिला ना?’’

‘‘म्हणून काय झालं? पुढे साड्या नेसेलंच ना ती? बायकोवर खर्च करायला पैसा असतो अन् सगळे हिशोब आमच्यावर खर्च करतानाच आठवतात.’’

दादा काहीच बोलला नाही. आई दोन तास त्यानंतरही संतापून बडबडत होती.

वहिनीने शालूची घडी आईसमोर ठेवत हळुवारपणे म्हटलं, ‘‘आई, हा शालू आपण शशीसाठीच ठेवूयात…खूप शोभेल हा रंग तिला.’’

आईने रागाने साडी दूर लोटली. ‘‘असू दे सूनबाई, आम्ही शालूसाठी आसुरलेले नाही आहोत. इतकाच पुळका होता तर आधीच तिच्यासाठी आणलं असतं. आता हा देखावा कशासाठी? तुमचा शालू तुम्हालाच लखलाभ होवो…’’ आई जोरजोरात रडायला लागली. ‘‘प्रशांतचे बाबा जिवंत होते तेव्हा खूप चांगलं चांगलं नेसलो. ते मला राणीसारखी ठेवायचे. आता तुमच्या भरवशावर आहोत ना? जसं ठेवाल, तसे राहू. जे द्याल ते वापरू, जे द्याल ते खाऊ…’’ किती तरी वेळ तो शालू तसाच जमिनीवर पडून होता. मग वहिनीने ती घडी उचलली अन् कपाटात ठेवली.

त्यानंतर काही महिन्यांनी दादाच्या एका सहकाऱ्याचं लग्न होत. आम्हा सर्वांना तो घरी येऊन अगत्याचं आमंत्रण देऊन गेला होता.

‘‘आज तो बनारसी शालू नेस ना? घेतल्यापासून तुझ्या अंगावर तो बघितलाच नाहीए…’’ दादाने वहिनीला आग्रह केला.

वहिनी शालू नेसून आली तेव्हा इतकी सुंदर दिसत होती की तिच्या चेहऱ्यावरची नजर काढू नये असं वाटत होतं. दादाही मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघत होता.

‘‘चला, चला…सगळे गाडीत बसा…’’ दादा घाई करू लागला.

आईने दादाकडे बघितलं अन् ती तिरस्काराने बोलली, ‘‘हे कपडे घालून तू लग्नाला चलतो आहेस?’’

‘‘का? नवा शर्ट आहे, छान आहे ना?’’

‘‘काय छान आहे? बाहीवर उसवलाय.’’

‘‘अरे च्चा! असं झालं होय? माझ्या लक्षातच आलं नाही…’’ दादा सरळपणे म्हणाला.

‘‘आता तू फाटका शर्ट घालून लग्नाला जा…अन् बायको मिरवतेय बनारसी शालू नेसून. तुला काही कळत का नाही? लोक बघतील तर काय म्हणतील?’’

‘‘मी शर्ट बदलून येतो.’’

‘‘आणा इकडे मी दोन मिनिटांत टाके घालून देते,’’ वहिनी म्हणाली.

दादावहिनी दोघंही पुन्हा खोलीत गेली. दादाने शर्ट बदलला होता. वहिनीनेही बनारसी शालू उतरवून ठेवून साधी सिल्कची साडी नेसली होती.

‘‘का गं बदललीस साडी? किती सुंदर दिसत होतीस?’’ दादा दुखावला गेला होता.

‘‘नाही हो, मला वाटलं, नवऱ्यामुलीपेक्षा मीच जास्त झगझगीत दिसेन की काय म्हणून बदलली.’’ वहिनीने उदास हसत सारवासारव केली.

दादा काहीच बोलला नाही.

त्या दिवसानंतर वहिनीने कधीही तो शालू नेसला नाही. दरवर्षी एकदा उन्हं दाखवून कापूर किंवा लवंगेच्या पुरचुंड्या घालून ती तो व्यवस्थित पांढऱ्या मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवायची.

वहिनीला आईचं बोलणं जिव्हारी लागलंय, हे मला कळत होतं. आमच्या वडिलांच्या अकाली निधनाने आई भयंकर चिडचिडी झाली होती. वहिनीशी तर ती फारच दुष्टपणे वागायची अन् अल्लड वयामुळे मीही अधूनमधून वहिनीची कागाळी आईकडे करून आगीत तेल घालण्याचं काम करत होते.

घरात मी धाकटी होते. सर्वांची लाडकी होते. मला वडिलांची उणीव भासू नये यासाठी दादा सतत प्रयत्न करायचा. शिवाय आम्ही त्याच्या आश्रयाने जगतो आहोत असा न्यूनगंड आईला किंवा मला येऊ नये म्हणूनही तो प्रयत्न करायचा. तरीही आई सतत त्याला टोचून बोलायची, दूषणं द्यायची. स्वत:तच मग्न असतो, बायकोचं कौतुक करतो, आईची-बहिणीची काळजी घेत नाही, एक का दोन…बिच्चारा दादा…कसं सगळं सोसत होता, त्याचं तोच जाणे.

दादा शासकीय अधिकारी होता. पगार फार नव्हता. पण शहरात त्याचा दरारा होता. प्रामाणिक व स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी म्हणून लौकिक होता. बेताच्या पगारामुळे काही वेळा महिन्याच्या शेवटी पैसे संपले की काटकसर करावी लागायची. एकदा ऐन दिवाळीत दादाकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याने आईला विश्वासात घेऊन त्याची परिस्थिती सांगितली. यंदा कुणालाच नवे कपडे नको करूयात अन् फटाके, दिव्यांच्या रोषणाईचा खर्चही बेतात ठेवूयात, वगैरे गोष्टींवर दोघांचं एकमत झालं.

‘‘पण छोटीसाठी मात्र दोन नव्या साड्या घ्यायलाच हव्यात हं! नवे कपडे नाही मिळाले तर तिची दिवाळी आनंदात जाणार नाही. त्यातून पोरीची जात..किती दिवस आपल्याकडे राहाणार आहे? शेवटी परक्याचं धन…’’

‘‘बरं!’’ दादाने मान हलवली.

नव्या साड्या नेसून मी घरभर हुंदडत होते. इतर कुणालाही नवे कपडे नव्हते. पण वहिनीच्या चेहऱ्यावर कुठेही त्रागा, औदासीन्य काहीही नव्हतं. ती मनापासून माझं कौतुक करायची. आई मात्र सतत तिचा राग राग करत असे. दादावहिनी कधी दोघंच कुठे बाहेर जायला निघाली की आईचा पारा चढायचा. ती तोंड फुगवायची. ती दोघं परत आली की आईच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. ‘‘प्रशांत, अरे, घरात लग्न न झालेली बहीण आहे, आधी तिच्या लग्नाचं बघ. मग तुम्ही नवराबायको हवं ते करा…मी काही बोलणार नाही.’’

कधीतरी वहिनीने केसात फुलं माळली, गळ्यात मोत्यांची माळ घातली तरी आईचा तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. ‘‘सुने, अगं सगळा वेळ नटण्याथटण्यात घालवशील तर तुझ्या मुलांकडे कधी बघशील? मुलं जन्माला घातलीत तर त्यांच्याकडे लक्ष नको द्यायला?’’

नवी साडी नेसून, मॅचिंग ब्लाउज, बांगड्या घालून वहिनी दादाबरोबर बाहेर जायला निघाली की आई तोंड वाकडं करून म्हणायची, ‘‘दोन मुलं झाली तरी अजून साजशृंगाराची हौस फिटली नाहीए. नटमोगरी कुठली…’’

banarasi-sari

वहिनीने नटावं, आपल्याबरोबर बाहेर यावंजावं असं दादाला वाटे. तिला छान साडी नेसून कानातलं, गळ्यातलं घालून तयार झालेली बघितली की त्याचा चेहरा खुलायचा. हेच बहुधा आईला आवडत नसे. तिला वाटे वहिनीने दादावर जादू केली आहे. म्हणूनच तो तिला कधी बोलत नाही. रोज सायंकाळी तो घरी आला की आई त्याच्यापाशी बसून वहिनीच्या कागाळ्या सांगायची. खरं तर ती इतकी सोशिक अन् शांत होती, की मलाही तिचं नवल वाटायचं. मला किंवा आईला तिने कधीही एका शब्दाने दुखावलं नव्हतं. तिच्या या गुणामुळेच दादा तिच्या प्रेमात होता. आई सदैव तिचा अपमान करायची, घालूनपाडून बोलायची, पण वहिनीने कधी दादाकडे तक्रार केली नाही. फारच झालं तर बिच्चारी आपल्या खोलीत बसून रडून घ्यायची. वहिनीचे दोघे धाकटे भाऊ होते. शाळेत शिकणारी ती मुलं कधीमधी बहिणीला भेटायला यायची. भाऊ आले की वहिनीला फार आनंद वाटायचा. ती त्यांच्यासाठी काहीतरी नवा पदार्थ करायची.

त्यावेळी आईच्या संतापाचा पारा चढायचा. ‘‘व्वा! आज तर उत्साह उतू जातोय सूनबाईचा. चला, भावांच्या निमित्ताने का होईना सर्वांनाच चांगलंचुंगलं खायला मिळेल. पण महाराणी सरकार, एक सांगा, तुमचे बंधुराज येताना नेहमीच रिकाम्या हाताने का येतात? बहिणीकडे जाताना काही भेटवस्तू न्यावी हे त्यांना कळत नाही का? येतात आपले रिकाम्या हातांनी…’’

वहिनी हळूच म्हणायची, ‘‘आई, अजून शाळकरी आहेत हो दोघंही…भेटवस्तू घेण्याइतके पैसे कुठे असतात त्यांच्याकडे?’’

‘‘म्हणून काय झालं?’ दहा पाच रुपयांची बिस्किटं तरी आणता येतात ना? पण नाही. दळभद्री कुटुंबातली आहेत ना? त्यांना रीतभात कशी ठाऊक असणार?’’

वहिनीला अशावेळी रडू अनिवार व्हायचं.

पुढे माझं लग्न ठरलं. माझ्या सासरची माणसं फार सजन्न होती. त्यांनी हुंडा, मानपान काहीही घेतलं नाही. दादाने खूप हौसेने माझं लग्न लावून दिलं. पाठवणीच्या वेळी वहिनीने तो बनारसी शालू माझ्या सूटकेसमध्ये ठेवला. ‘‘छोटी, माझ्याकडून तुला ही भेट.’’

‘‘वहिनी, अगं हा तुझा लाडका शालू…’’

‘हो गं, पण नेसायची वेळ येतेय कधी? तू नवी नवरी, तुला तो शोभेल अन् नेसलाही जाईल. नेसशील तेव्हा माझी आठवण काढ.’’

मी वहिनीला मिठी मारली. मनात म्हटलं, ‘‘खरंय वहिनी, तुझी आठवण नेहमीच काढेन. तुझ्यासारख्या स्त्रिया जगात किती कमी असतात. इतक्या उदार मनाच्या, इतक्या सोशिक, कधीही तोंडातून तक्रारीचा सूर न काढणाऱ्या…मी तुझ्यासारखी होण्याचा प्रयत्न करेन.’’

माझं सासरचं घर भरलं गोकुळ होतं. एक धाकटा दीर, दोघी नणंदा, सासू, सासरे, कुठल्याही नवपरीणित जोडप्याप्रमाणे आम्हा नवराबायकोलाही एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवावा असं वाटे. सायंकाळी नवरा घरी आल्यावर आम्ही दोघं बाहेर फिरायला जाण्याचा बेत असायचा. मी आवरायला लागले की नणंद म्हणायची, ‘‘मीही येऊ का तुमच्याबरोबर?’’

सासूबाई म्हणायच्या, ‘‘काही गरज नाही. आधी होमवर्क पूर्ण कर अन् संध्याकाळच्या स्वयंपाकात मला थोडी मदत कर.’’ नणंद चिडायची. धुसफुसायची पण सासूबाईंचं म्हणणं कुणी टाळत नसे.

मला कळायचं, आम्हाला मोकळेपणा मिळावा म्हणून त्या सीमाला आमच्याबरोबर पाठवत नव्हत्या. मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटायची अन् त्याचवेळी माझी आई माझ्या वहिनीशी कशी वागायची हेही आठवयाचं.

एकदा दादा मला भेटायला आला होता. आईने त्याच्याबरोबर काही भेटवस्तू पाठवल्या होत्या…सासूबाईंनी सर्व वस्तूंचं मनापासून कौतुक केलं होतं. सर्वांना वस्तू दाखवल्या. आईला व दादाला नावाजलं.

मला म्हणाल्या, ‘‘शशी, तुझा दादा प्रथमच आलाय आपल्या घरी. त्याच्या आवडीचा स्वयंपाक कर. एक दोन पक्वान्नं कर.’’ माझंही मन आनंदलं अन् पुन्हा आईची अन् सासूबाईंची तुलना मनाने केलीच. वहिनीच्या माहेरचं कुणी घरी आलं की आईचा रूद्रावतार ठरलेला. स्वत:चा राग, असंतोष व्यक्त करण्यासाठी ती स्वयंपाकघरात जोरजोरात भांडी आपटायची.

माझं लग्न झाल्यावर आईने मला एकांतात बोलावून बजावलं होतं, ‘‘हे बघ छोटी, तुझा नवरा देखणा आहे. त्या मानाने तू डावी आहेस. तुला सांगते ते नेहमी लक्षात ठेव. कायम नटूनथटून व्यवस्थित राहा. स्वत:ला आकर्षक ठेव, तरच नवरा तुझ्यावर प्रेम करेल.’’

‘‘पण वहिनी थोडीही नटली तर तू तिला केवढी ओरडायचीस?’’ मी म्हटलं.

‘‘तिची गोष्ट वेगळी, तुझी गोष्ट वेगळी.’’ आई म्हणाली होती.

इथे माझ्या सासरी कोणताही सण, समारंभ, उत्सव असला की माझी सासू आग्रह करून मला नवी साडी नेसायला लावायची. दागिने घालायला लावायची. सगळ्यांना सांगायची, ‘‘बघा, माझी सून कशी छान दिसतेय ना?’’

तिथे माझ्या आईने लक्ष्मीसारख्या माझ्या वहिनीला सतत धारेवर धरलं होतं. एक दिवस कधी बिचारी सुखाने राहिली नाही. सतत टोमणे, सतत संताप, दादाच्या आयुष्यातही तिने विषय कालवलं होतं. वहिनी तर बिचारी करपून गेली होती.

मला वाटतं त्यामुळेच वहिनीला जीवनाची आसक्ती उरली नव्हती. कॅन्सर झालाय हेदेखील तिने दादाला कळू दिलं नाही. मुकाट्याने घरकामाचा डोंगर उपसत राहिली. दादाच्या लक्षात आलं तेव्हा फार उशीर झाला होता.

मी दादाच्या घरी पोहोचले तेव्हा प्रेतयात्रेची तयारी झाली होती. मी बरोबर आणलेला बनारसी शालू तिच्या निष्प्राण देहावर पसरवला अन् अत्यंत आदराने तिला नमस्कार केला

‘‘छोटी, अगं काय करते आहेस? थोड्या वेळातच सगळ्याची राख होणार आहे.’’ आईने मला बाजूला घेऊन दमात घेतलं.

‘‘होऊ दे…’’ मी कोरडेपणाने उत्तरले. मला डोळ्यांपुढे वहिनीचं ते नववधूचं रूप दिसत होतं. सुंदर सतेज चेहरा, ओठावर सलग हास्य अन् डोळ्यांत नव्या संसाराची कोवळी स्वप्नं…

तिरडी उचलली तेव्हा आईचा आक्रोश सर्वांपेक्षा अधिक होता. ती हंबरडा फोडून रडत होती. दादा तर जणू दगड झाला होता. दोन्ही मुलं रडत होती पण धाकटी पाच वर्षांची स्नेहा काहीच न समजल्यामुळे बावरून उभी होती. मी तिला उचलून घेतली. दहनविधी आटोपून घरी परतलेल्या दादाला मी म्हटलं, ‘‘मुलं मोठी आहेत. काही दिवसांनी त्यांना हॉस्टेलला ठेव. हिला मी नेते. मी हिला सांभाळेन, वाढवेन. अन् तू म्हणशील तेव्हा तुझ्याकडे परत पाठवेन.’’

तेवढ्यात आईने म्हटलं, ‘‘छोटी, अगं भलतंच काय बोलतेस? तुझ्यावर कशाला तिची जबाबदारी? उगीचच तुला त्रास?’’

‘‘नाही आई, मला अजिबात त्रास होणार नाही. उलट, ती इथे राहिली तर तूच तिला सांभाळायला असमर्थ ठरशील.’’

‘‘अगं पण, तुझ्या सासूला विचारलं नाहीस, अन् एकदम हिला नेलीस तर त्यांना काय वाटेल? त्या काय म्हणतील?’’

‘‘माझी सासू तुझ्यासारखी नाहीए. त्यांना माझा निर्णय आवडेल. त्या मला पाठिंबाच देतील,’’ मी ठामपणे बोलले.

मला वाटतं वहिनी वरून आमच्याकडे बघते आहे.?शांत, प्रसन्न हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे… ‘‘वहिनी,’’ मी मनातच बोलले, ‘‘तुजी ही लेक मी नेते आहे. तुझा ‘अनमोल ठेवा’ म्हणूनच मी तिला वाढवेन. मला खात्री आहे, ही तुझेच संस्कार घेऊन जन्माला आली आहे. तुझं रूप मी तिच्यात बघते आहे. तू निश्चिंत राहा…’’

तू माझ्यासाठी काय केलंस

कथा * पद्मा आगाशे

रात्रीचे दोन वाजून गेलेले. अजून प्रसून घरी आला नव्हता. गेले काही दिवस तो रोजच रात्रीपर्यंत घराबाहेर असायचा. उमाही त्याची वाट बघत जागी होती.

गेटच्या आवाजानं ती उठून बाहेर आली. ड्रायव्हरनं दारुच्या नशेत असलेल्या प्रसूनला आधार देत घरात आणलं.

उमा संतापून ओरडली, ‘‘अरे काय दुर्दशा करून घेतली आहेस स्वत:ची? किती अधोगती अजून करून घेशील? स्वत:ची अजिबात काळजी नाहीए तुला?’’

प्रसूनही तसाच ओरडला. शब्द जड येत होते पण आवाज मोठाच होता, ‘‘तू आधी उपदेश देणं बंद कर. काय केलं आहेस गं तू माझ्यासाठी? मला लग्न करायचंय हजारदा सांगतोए, पण तुला तुझ्या आरामातून वेळ मिळेल तेव्हा ना? स्वत:चा मुलगा असता तर दहा ठिकाणी जाऊन मुलगी शोधली असती.

‘‘तुला माझ्या पैशांवर मजा मारायला मिळतेय, साड्या, दागिने, आलिशान गाडीतून फिरायला मिळंतय, तुला काय कमी आहे? पण मला तर माझ्या शरीराची भूक भागवायला काहीतरी करायलाच हवं ना? आधीच मी त्रस्त असतो त्यात तुझ्या बडबडीने डोकं उठतं.’’ तो लटपटत्या पायांनी त्याच्या खोलीत निघून गेला. धाडकन् दार लावून घेतलं.

प्रसूनच्या बोलण्यानं उमाच्या हृदयाला भोकं पडली. ती उरलेली सगळी रात्र तिनं रडून काढली. प्रसून तिच्या बहिणीचा मुलगा. त्याच्यासाठी तिनं आपलं सगळं आयुष्य वेचलं. वडिलांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. लग्न केलं नाही. सगळं लक्ष केवळ प्रसूनवर केंद्रित केलं होतं.

मीराताईचे यजमान सुरुवातीला प्रसूनला भेटायला यायचे. पण उमाच्या लक्षात आलं त्यांचा तिच्यावरच डोळा आहे. एकदा त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं सरळ त्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर ते कधीच इकडे फिरकले नाहीत. उमानंही त्यानंतर कुठल्याही पुरुषाला आपल्या आयुष्यात जागा दिली नाही.

प्रसूनच तिचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ होता. त्याच्या आनंदातच तिचाही आनंद होता. तिच्या अती लाडानंच खरं तर तो बिघडला होता. अभ्यासात बरा होता. पण त्याच्या डोळ्यांपुढे स्वप्नं मात्र पैसेवाला, बडा आदमी बनण्याची होती.

तो बी. कॉम झाल्यावर उमानं एमबीएला एडमिशन मिळवण्यासाठी खूप पैसे खर्च केले. एकदा त्याला नोकरी लागली की छान मुलगी बघून लग्न करून द्यायचं अन् आपण आपलं म्हातारपण आनंदात घालवायचं असा उमाचा बेत होता.

प्रसून दिसायला वडिलांसारखाच देखणा होता अन् त्यांच्यासारखाच लंपट अन् बेजबाबदारही. जेव्हा तो एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला होता तेव्हाच जया नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. खरं तर त्यानं तिच्या करोडपती वडिलांचा पैसा बरोबर हेरला होता. त्याच्या देखण्या रूपावर अन् गोड गोड बोलण्यावर भाळलेल्या जयानं एक दिवस घरातून खूपसे दागिने घेऊन पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी उमाच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिला बिचारीला काहीच कल्पना नव्हती. ती पोलिसांना काय सांगणार? दोन दिवस पोलीस कोठडीत काढल्यावर तिची सुटका झाली.

दोन महिने लपतछपत काढल्यावर शेवटी पोलिसांनी जया व प्रसूनला शोधून काढलंच. जयाच्या वडिलांनी आपला पैसा व प्रतिष्ठेच्या जोरावर लेकीला तर सोडवली पण प्रसून मात्र दोन वर्षं तुरुंगात होता.

उमासाठी हा फार मोठा धक्का होता. पैसा गेला, समाजात नाचक्की झाली. पण प्रसूनचं प्रेम ती विसरू शकली नाही. तो तुरूंगातून सुटून आला तेव्हा ती त्याच्यासाठी तुरुंगाबाहेर उभी होती. तिच्या खांद्यावर डोकं टेकवून प्रसून लहान मुलासारखा रडला. मग त्यांनी ते शहर सोडण्याचा निर्णय घेतला.

थोडंफार सामान घेऊन दोघंही पुण्याला आली. बऱ्याशा वस्तीत छोटं घर घेतलं. प्रसून नोकरी शोधू लागला. उमानं काही ट्यूशनस मिळवल्या. प्रसूनला एका प्लेसमेंट एजन्सीत नोकरी मिळाली. अंगभूत हुशारी व तीक्ष्ण नजर या जोरावर प्रसूननं तिथली कामाची पद्धत पटकन शिकून घेतली. त्या धंद्यातले बारकावे जाणून घेतले. वर्षभरातच त्यानं स्वत:ची कंपनी सुरू केली.

पाच-सहा वर्षं चांगली गेली. आता पॉश कॉलनीत बंगला, आलिशान गाडी, शोफर, पैसा अडका सगळं होतं, पण प्रसूनचं लग्न होत नव्हतं. एक जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सहा महिने राहिली पण मग तीही सोडून गेली.

प्रसून अत्यंत तापट अन् अहंकारी होता. पत्नीला गुलाम म्हणून वागवण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच मुली लग्नाला नकार द्यायच्या.

प्लेसमेण्टसाठी येणारी मुलं कमिशन देऊन निघून जायची. पण श्रेयाला त्यानं चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंधही ठेवले. वर त्याची फोटोग्राफी करून तिला ब्लॅकमेल करू लागला. ती घाबरून त्याला भरपूर पैसे देऊ लागली. मग तर त्यानं अनेक मुलींना या पद्धतीनं फसवलं. श्रेयानं व इतर दोघींनी पोलिसात तक्रार केल्यावर ऑफिसवर पोलिसांनी धाड घातली. कसाबसा तो त्या प्रकरणातून सुटला. या सर्व गोष्टींचा उमाला अजिबात पत्ता नव्हता.

दुसऱ्यादिवशी सकाळी चहाचा ट्रे घेऊन उमा जेव्हा प्रसूनच्या खोलीत गेली, तेव्हा तो चांगल्या मूडमध्ये होता. रात्रीच्या रागाचा कुठे मागमूसही नव्हता.

‘‘प्रसून तू इंटरनेटवर तुझा प्रोफाइल रजिस्टर करून घे. एखादी चांगली मुलगी भेटेलही.’’ तिनं प्रेमानं म्हटलं.

‘‘होय, मावशी, मी केलंय.’’ तो ही उत्तरला.

‘‘मी ही प्रयत्न करतेय.’’ मावशी म्हणाली.

‘‘मावशी, कुणी घटस्फोटितही चालेल. मीही आता चाळीशीला आलोच की!’’ प्रसून म्हणाला.

मावशीनं मॅरेज ब्यूरोमध्ये नांव नोंदवलं. प्रोफाइल बनवून नेटवर टाकलं. चांगले फोटो त्यावर टाकले.

इकडे प्रसूनला ऑनलाइन चॅटिंग करताना मान्यताची फ्रेण्डरिक्वेस्ट दिसली. त्यानं होकार दिला. दोघांचं चॅटिंग सुरू झालं. मान्यता स्वच्छ मनाची मुलगी होती. तिनं  स्वत:विषयी सगळं खरं खरं प्रसूनला सांगितलं. प्रसूननंही तिला खूप गोड गोड बोलून भुलवलं. त्यानं अधिक खोलात जाऊन माहिती मिळवली की मान्यताच्या वडिलांचा व्यवसाय आहे. कनॉट प्लेसमध्ये तीन मजली घर आहे. खाली दुकानं आहेत. त्यांचं भाडंच लाखात येतं अन् मान्यताच त्या सगळ्याची एकमेव वारस आहे.

त्यानं उमाला म्हटलं, ‘‘मावशी माझ्यासाठी हे स्थळ खूपच योग्य आहे. मान्यताचा घटस्फोट झालाय. तिला एक लहान मुलगा आहे. आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. पुन्हा लग्न करणार नाही म्हणतेय. पण तिला लग्नासाठी राजी करावं लागेल. त्यानं प्रोफाइल उघडून मान्यताचे फोटो मावशीला दाखवले.’’

अशाबाबतीत हुशार प्रसूननं एजंटच्या मध्यस्तीने मान्यताच्या घराच्या जवळच एक फ्लॅट भाड्यानं मिळवला. उमा तिथं शिफ्ट झाली. तिनं सोसायटीत सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. तिथल्या किटी पार्टीची ती सभासद झाली.

एक दोनदा प्रसून येऊन गेला. ‘माझा मुलगा’ अशी तिनं ओळख करून दिली. सोसायटीत तर बस्तान चांगलं बसवलं.

मग एका किटी पार्टीत मान्यताच्या आईशीही ओळख झाली. ती ओळख उमानं जाणीवपूर्वक वाढवली. मुद्दाम त्यांच्याकडे येणंजाणं वाढवलं.

‘‘माझा मुलगा आहे. शिक्षण, रूप, पैसा, व्यवसाय सगळं आहे पण लग्न करायचं नाही म्हणतो. तरूण वयात कुणा मुलीच्या प्रेमात होता. तिनं विश्वासघात केला. प्रेमभंगांचं दु:ख अजून पचवता आलेलं नाहीए. मध्यंतरी यावरूनच आमचा वाद झाला. त्याच्या रागावर मी इथं येऊन राहिलेए.’’ असं उमानं त्यांना सांगितलं.

उमानं एकदा मुद्दामच विचारलं, ‘‘माफ करा, पण तुम्ही अन् मान्यता, तिचे बाबा असे उदास अन् दु:खी का दिसता?’’

मान्यताच्या आईला, निशाला एकदम रडू फुटलं, ‘‘काय सांगू ताई तुम्हाला? अहो, इतक्या थाटामाटात आम्ही मान्यताचं लग्न करून दिलं होतं. श्रीमंत कुटुंबातला एकुलता एक मुलगा. पण वर्षभरही आमची पोरगी राहू शकली नाही. त्या मुलाचे दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध होते. हे असं कोणती पत्नी सहन करेल?’’

मान्यतानं नवऱ्याला प्रेमानं खूप समजावलं, पण तो ऐकत नव्हता. आम्ही दोघांनीही जावयाची समजूत घातली. मुलीचा संसार उधळू नये असंच आम्हालाही वाटत होतं. पण त्यानं जणू न सुधारण्याची शपथच घेतली होती.

त्यात एक दिवस त्यानं मान्यताला मारहाण केली. त्यानंतर ती जी इथं आली ती परत गेलीच नाही. त्यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर होती. तिच्या सासूसाऱ्यांना मुलाचं प्रकरण माहित होतं पण चांगली सून घरात आली की तो बदलेल या आशेवर त्यांनी लेकाचं लग्न केलं होतं.

त्यांनी हात जोडून क्षमा मागितली. आम्ही दिलेलं सर्व सामान, दागिने, कपडे सगळं परत केलं. एक कोटी रुपयांची एफडी मान्याताच्या नावे केली, पण त्या पैशानं सुखसमाधान कसं मिळणार?

आमचं तर आयुष्यच अंधकारमय झालंय. तिच्या लहानग्या आयुष्यामुळेच आमच्या आयुष्यात थोडा फार आनंद आहे. मान्यता तर अजूनही त्या धक्क्यातून सावरली नाहीए. लग्न करायला नाहीच म्हणते. तिच्या बाबांनी तिला विरंगुळा म्हणून शाळेत नोकरी लावून दिली आहे.

आता उमानं लहानग्या आयुषवर लक्ष केंद्रित केलं. ती त्याला कधी बागेत न्यायची, कधी होमवर्क करवून घ्यायची, कधी गाणी गोष्टी सांगायची. प्रसून दिल्लीला आलेला असताना मुद्दाम उमानं निशा अन् मदनला, मान्यताच्या बाबांना घरी चहाला बोलावलं. त्याचं देखणं रूप, त्याची मर्यादेशील वागणूक व हसरा, आनंदी स्वभाव बघून दोघांनाही तो खूप आवडला. पण आपली मुलगी घटस्फोटित आहे, या प्रथमवराला कसं विचारावं या विचारानं ते गप्प बसले.

प्रसून अन् उमानं ठरवलेल्या योजनेप्रमाणेच सगळं चाललेलं होतं. आता त्यांनी मान्यतावर लक्ष केंद्रित केलं. आता प्रसून पुन्हा पुन्हा दिल्लीला येत होता. उमानं निशा व मदनला सांगितलं की प्रसूनला मान्यता आवडली आहे. तो तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आयुषलाही तो आपला मुलगा मानायला तयार आहे.

निशा व मदनला तर फारच आनंद झला. प्रसूनही बराच वेळ आयुषबरोबर घालवायचा. येताना त्याच्यासाठी खाऊ व खेळणी आणायचा. त्याच्याबरोबर व्हिडिओ गेम्स खेळायचा.

एक दिवस आयुषनं मान्यताला म्हटलं, ‘‘मम्मा, प्रसून काका किती छान आहेत. मला आवडतात ते.’’

मान्यतालाही प्रसूनविषयी आर्कषण वाटत होतं. त्याचं देखणं रूप अन् मोठमोठ्या गोष्टी यामुळे तीही त्याच्यात गुंतत चालली होती. हळूहळू तो आयुष व मान्यताला आइसक्रीम खायला नेऊ लागला. कधी तरी उमा,   मान्यता अन् प्रसून सिनेमालाही गेले. आता तर उमानं उघडच बोलून दाखवलं की मान्यता व प्रसूनचं लग्न झालं तर किती छान होईल म्हणून निशा व मदननं विचार केला की एकदा प्रसूनच्या एजन्सीविषयी माहिती काढावी. मदनलाही मुलगा आवडला होता. त्यांनी पुण्याला जाऊन यायचं ठरवलं. पण ही गोष्ट उमा अन् प्रसूनला कशी समजली कोण जाणे. प्रसून तर सरळ त्यांना एअरपोर्टला रिसीव्ह करायला पोहोचला. त्यांना आपलं ऑफिस दाखवलं. मोठा बंगला दाखवला. गाडीतून सगळीकडे फिरवलं. पंचतारांकित हॉटेलात त्यांना लंचला नेलं.

इतर कुणाला त्यांच्याजवळ येऊ दिलं नाही. कुणाला त्यांना भेटू दिलं नाही. साध्या सरळ मदनला प्रसूनचं वैभवी आयुष्य खरंच वाटलं. आता त्यांना मान्यता व प्रसूनचं एकत्र असणं यात गैर वाटेना. दोघांच्या लग्नाचा बेत त्यांच्या मनात पक्का होता.

लबाड प्रसूननं मान्यताच्या वाढदिवसाला एका पार्टीचा कार्यक्रम ठरवला. मान्यतासाठी हे सरप्राइजच होतं. त्या दिवशी उमानं तिला एक डिझायनर साडी भेट म्हणून दिली. मान्यताही मनापासून नटली. त्या साडीत ती खूपच छान दिसत होती. आई, वडिल, आयुष यांच्याबरोबर जेव्हा ती हॉटेलात पोहोचली तेव्हा तिथं खूपच मोठी पार्टी बघून ती चकित झाली. प्रसूननं केवढा मोठा केक ऑर्डर केला होता. मान्यताला प्रसूनबद्दल आदर वाटला. त्यातच भर म्हणून तिच्या आईवडिलांनी या वेळीच मान्यता व प्रसूनच्या साखरपुड्याची अनाउंसमेट केली. मदननं दोन हिऱ्यांच्या आंगठ्या प्रसून व मान्यताच्या हातात देऊन त्या एकमेकांना घालायला लावल्या. सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा गजर झाला. मान्यताही खूप आनंदात होती. तिनं प्रसूनसोबत डान्सही केला.

आता तर तिला सतत प्रसूनजवळ असावं असं वाटायचं. त्यांचं गोड गोड बोलणं, तिचं कौतुक करणं तिला फार आवडायचं. आयुषनं तर एक दिवस तिला म्हटलं, ‘‘आता प्रसून काकांना बाबा म्हणणार आहे. शाळेत सगळ्या मुलांचे बाबा येतात. माझेच बाबा येत नाहीत. आता मी माझ्या मित्रांना दाखवेन की हे बघा माझे बाबा.’’

लग्नाची खरेदी जोरात सुरू होती. आमंत्रण पत्रिकाही छापून झाल्या. अजून मान्यतानं तिच्या?शाळेत तिच्या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तिच्या बोटातली हिऱ्याची अंगठी बघून तिच्या सहकारी टीचर्सनं तिला छेडलं तरी तिनं त्यांना दाद दिली नव्हती.

पण प्रिन्सिपल मॅडमनं एकदा तिला ऑफिसात बोलावून विचारलंच, ‘‘मान्यता, लग्न ठरलंय म्हणे तुझं? मनापासून अभिनंदन. नवं आयुष्य सुरू करते आहेस…सुखात राहा. कुठं जाणार आहेस आता?’’

‘‘पुणे,’’ मान्यातानं सांगितलं.

‘‘मला खरंच खूप आनंद झाला ऐकून. अगं तरुण वयात मी ही फसवुकीला सामोरी गेले आहे. विश्वासघाताचं दु:ख मी ही पचवलं आहे. पण अक्षयसारखा नवरा भेटला अन् त्याच्या प्रेमामुळे जीवनातील कटू विषारी अनुभव पचवून आता सुखाचा संसार करते आहे.’’

‘‘होय मॅडम, प्रसूनही फार चांगले आहेत. आयुषवरही ते फार प्रेम करतात. त्यामुळेच मी लग्नाला तयार झालेय.’’

‘‘नाव काय सांगितलंस तू? पुन्हा सांग बरं.’’

‘‘प्रसून! प्रसून नाव आहे त्यांचं. पुण्यात प्लेसमेंट एजेंसी चालवतात. खूप छान व्यवसाय आहे.’’

मॅडम जरा विचारात पडल्या. मग म्हणाल्या, ‘‘साखरपुड्याचे फोटो असतील ना? मला बघायचाय तुझा नवरा.’’

‘‘आता माझ्याकडे नाहीएत फोटो, पण मी तुमच्या ईमेलवर पाठवते. खूपच देखणे आहेत ते.’’

मॅडम जया त्या स्कूलच्या ओनर होत्या. साखरपुड्याचे फोटो बघताच त्या दचकल्या. हो तोच प्रसून ज्याच्या म्हणण्यावरून तरुण अल्लड जया घरातले  दागिने घेऊन पळाली होती. मान्यताला सांगावं का? पण नको, कदाचित इतक्या वर्षांत प्रसून बदलला असेल, सुधारला असेल. तरीही शोध घ्यायला हवा. शहानिशा करावीच लागेल. त्यांनी आपल्या एका वकील मित्राला फोन करून प्रसून व त्याची एजन्सी याची चौकशी करायला सांगितली. तो पुण्यातच राहात होता.

दुसऱ्याच दिवशी त्या मित्रानं बातमी दिली. प्लेसमेट एजन्सीच्या आड सेक्स रॅकेट चालवलं जातं. एजन्सीवर पोलिसांनी बरेचदा धाड घातली आहे. प्रसून अत्यंत नीच व बदनाम माणूस आहे. पोलिसही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करताहेत.

आता जयाचा संशय खात्रीत बदलला. हा तोच नराधम आहे. तिनं मान्यताला फोन करून ताबडतोब घरी बोलावून घेतलं. ‘‘मान्यता, आय अॅम सॉरी, बातमी वाईट आहे पण तुझ्या भल्यासाठीच सांगते. हा तोच प्रसून आहे ज्यानं मला दगा दिला होता. माझे दागिने लांबवून त्यानं मला भिकेला लावलं होतं. सध्या तो प्लेसमेंट एजेन्सीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवतो. अनेक मुलींना त्यानं असंच फसवलं आहे. माझ्या मते तुझ्याशी लग्नही केवळ तुझ्या प्रॉपर्टीसाठी करतोय तो. भयंकर लोभी माणूस आहे.’’

ऐकताच मान्यता रडायला लागली. ‘‘मॅडम, माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येणारच नाहीत का? असं काय घडतंय माझ्या आयुष्यात…’’

‘‘मान्यता, धीर धर, आधी या नीच माणसाला पोलिसात देऊयात. त्याला कळणार नाही इतक्या पद्धतशीरपणे आपण प्लॅन करूया.’’

मान्यतानं डोळे पुसले. ‘‘होय मॅडम, याला अद्दल घडवलीच पाहिजे. उद्याच याला पोलिसांच्या हवाली करते. तुम्ही उद्या सायंकाळी माझ्या घरी याल का? पाच वाजता?’’

‘‘नक्की येते. पाच वाजता.’’

घरी येऊन मान्यतानं प्रसूनला फोन केला. ‘‘प्रसून जरा येऊन जा. आईबाबा त्यांचं विल करताहेत. तुझी गरज लागेल.’’

‘‘विल करताहेत हे फारच छान आहे. मी उद्या येतो.’’ प्रसून म्हणाला.

प्रसून घरी आला. निशा व मदन त्याचं अतिथ्य करू लागले. त्यांना आदल्या दिवशी घडलेलं काहीच ठाऊक नव्हतं. प्रसूननं मान्यताला म्हटलं, ‘‘आईबाबा तुला जे काही दागिने व कॅश लग्नात देताहेत ते सगळं तू घे. ‘नको नको’ म्हणू नकोस. अन् त्यांनी विल केलं म्हणालीस, ते कुठंय? त्यांच्यानंतर तर सगळं आपल्यालाच मिळणार आहे ना?’’

‘विल’, ‘दागिने’, ‘कॅश’, ‘त्याच्यानंतर सगळं आपलं’ ही भाषा निशा व मदन दोघांनाही खटकली. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. प्रसून खिडकीपाशी उभं राहून मोबाइलवर बोलत होता. त्यावेळी निशानं म्हटलं, ‘‘मला तर हा लोभी वाटतोय. कॅश अन् विलच्या गोष्टी आत्ता का बोलतोए? आधीच आपल्याकडून धंदा वाढवायचा म्हणून वीस लाखांचा चेक घेतलाए. मान्यतालाही हे कळलं तर ती लग्नाला नकार देईल.’’

‘‘मलाही आज त्यांचं वागणं संशयास्पद वाटतंय. पैशासाठी आमचा खूनही करेल हा.’’ मदन म्हणाले.

तेवढ्यात जया आल्याचा निरोप वॉचमननं दिला. तो जयाला मान्यताच्या दाराशी सोडून गेला. प्रसूननं जयाला प्रथम ओळखलं नाही. मान्यतानं मुद्दाम ओळख करून दिली. ‘‘मॅडम जया, हे माझे होणारे पती प्रसून.’’

जयानं दरडावून म्हटलं, ‘‘अजून किती जणींना फसवून पैसा गोळा करणार  आहेस प्रसून? तुझ्या पापाचा घडा भरलाय. पुण्याहून तुझ्याबद्दलची सगळी माहिती मला मिळाली आहे. ती मी दिल्ली पोलिसांना दिली आहे.’’

हे ऐकून बाबांना तर घेरीच आली. आईही धाय मोकलून रडू लागली. ‘‘मावशी रडू नका. तुमची मुलगी एका नरपिशाच्चाच्या तावडीतून सुटली म्हणून आनंद माना,’’ जयानं त्यांना समजावलं.

प्रसून पळून जायला बघत होता. तेवढ्यात सिक्युरिटीवाल्यांनी त्याला घेरलं. उमा पण तिथं आलेली होती. ती म्हणाली, ‘‘याला क्षमा करा. आम्ही इथून निघून जातो. मी हात जोडते…’’

प्रसून तिच्यावर ओरडला, ‘‘गप्प बैस, तू माझ्यासाठी काय केलं आहे. फक्त सतत म्हणायची लग्न कर, लग्न कर…झालं माझं लग्न…’’

आता उमाचाही संयम संपला, ‘‘माझं सगळं आयुष्य मी याच्यासाठी झिजवलं. तरी याचं म्हणणं मी याच्यासाठी काहीच केलं नाही…आता तर मीच पोलिसांना सांगेन याचे सगळे प्रताप. कोर्टात याच्याविरूद्ध मी साक्ष देईन.’’ ती म्हणाली.

पोलीस प्रसूनला घेऊन गेले.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें