उत्सवांपासून अलिप्त !

मिश्किली * माधव गवाणकर

सणउत्सवांपासून अलिप्त, दूर राहण्याची प्रवृत्ती माझ्यात आणि माझ्या काही बुद्धिवादी मित्रांमध्ये का निर्माण झाली? ते काही माझ्यासारखे अविवाहित नव्हते आणि मी विवाहित असतो, तरी ‘आरोग्य’ विषयाचा अभ्यास असल्यामुळे मी सणांपासून अलिप्तच राहिलो असतो.

कदाचित माझ्या पत्नीने ‘जरा म्हणून हौस नाही’ म्हणत मला नाक मुरडले असते. आईला दम्याचा त्रास व्हायचा. ‘अटॅक’च यायचा म्हणून मी दिवाळीतले फटाके कुमारवयातच बंद केले. इतरांचा विचार करणं हाच ‘धर्म’ आहे असं मी मानू लागलो. तेवढे ‘धूर’ होऊन जाणारे पैसेही वाचले. वेळेची बचत होऊ लागली. वाचनामुळेच मला फटाक्यांचं उपद्रवमूल्य कळलं. तेव्हा वाचन संस्कृती हीच माझ्या मते मराठी घराची गरज आहे.

एखादी गोष्ट केवळ समूह करतो म्हणून आपणही केलीच पाहिजे असं मला कधीच वाटलं नाही. रांगोळी हीसुद्धा मुलींनीच घातली पाहिजे असंही मी मानत नाही. रंगरेषांची आवड मुलांनाही असतेच की. बहुतेक सण कोकणात रात्री उशिरापर्यंत साजरे होतात. नाचगाणी असतात. माझ्या पित्तप्रकृतीला जागरण हा  विषय जमण्यासारखा नाही, हेसुद्धा एक कारण असावं. मी व्यसनं करत नाही,    त्यामुळे तरूणांच्या उत्साही ‘कार्यक्रमात’ मला कधीच स्थान नव्हतं. ते माझ्या पथ्यावर पडलं व मी सणांपासून दूर गेलो. कोकणात लग्नही सणासारखं वाजतगाजत करतात, पण मी अविवाहित असल्यामुळे मला अनेकजण लग्नकार्याला बोलावत नाहीत. अविवाहितांच्या स्वातंत्र्याचा द्वेष त्यात मिसळलेला असतोच, पण त्याचा फायदा असा झाला की लग्नातल्या ध्वनिप्रदूषणापासून मी बचावलो. त्यातली काही लग्न ‘फेल’ गेली हे आपण  बाजूला ठेवू!

‘देव’ ही संकल्पना नाकारल्यामुळे उत्सव कशासाठी साजरा करायचा? हा प्रश्न मला पडणं स्वाभाविक होतं. ‘फराळ’ वर्षभर मिळतो. कडबोळी, चिवडा, चकली, चिरोटे सगळं मी मनात येईल तेव्हा मटकावत असतो. मग दिवाळीत त्याचं वेगळं प्रयोजन काय? घरातल्या बायामाणसांनी फराळाचा व्याप करणं हे मला बघूनसुद्धा बोअरिंग वाटायचं. ‘रक्षाबंधन’ला एकही राखी न बांधता मी निघालो होतो. एका शाळकरी पोराने माझ्या ‘रिकाम्या’ मनगटाकडे आणि नंतर माझ्या चेहऱ्याकडे तुच्छतेने पाहिले की, हा कोणत्या ग्रहावरचा प्राणी? एकही राखी बांधून घेतली नाही याने? त्या पोराचं मनगट ४-५ राख्यांमुळे दिसेनासं झालं होतं. कदाचित मुलगा जन्माला येईपर्यंत मुलींना जन्म देत राहणं ही जी प्रथा आहे, त्यातलं ते कुटुंब असेल. मला त्या मुलाचं हसू आलं. किरकोळ प्रकृतीचा तो काडी पैलवान आपल्या बहिणींचं रक्षण कसं काय करणार होता? राखीचा अर्थ तरी त्याला कुणी सांगितला असेल का? आणि कमावत्या मुलींना भावाच्या आधाराची गरज का भासावी? त्यांनी शारीरिकदृष्ट्या सशक्त का असू नये? एकमेकींसाठी धाव घेणारा, गुंडाला बुकलणारा त्यांचा ‘सपोर्ट ग्रुप’ का असू नये? रूढी केवळ पाळायची म्हणून पाळायची व न पाळणाऱ्याबद्दल अढी बाळगायची. हे काही बरोबर नाही.

सुरेशला (खरं नाव वेगळं) मी सांगायचो. ‘अरे मित्रा, तुम्ही उत्सवाच्या वेळी दरवर्षी तुमच्याच आईला आजारी पाडता. बिचारी ती माऊली सण संपला की ती आजारी पडते. एवढं काम, एवढी दगदग तिला होते. तुम्ही हे प्रस्थ थोडं कमी करू शकत नाही का? माणुसकी हा धर्म महत्त्वाचा नाही का? पण तो खूप घाबरायचा. त्या मित्राला घरात, एकत्र कुटुंबात तशी किंमत नव्हती. शेवटी त्याच्या आईला ब्लड कॅन्सरही झाला. जन्मभर काबाड, कष्ट करणाऱ्या या     भाबड्या, सज्जन महिलांचे संसरात किती हाल होतात. सण अगदी मर्यादित स्वरूपात, गंमत म्हणून, बदल म्हणून केले तर या महिला वर्गाला दिलासा मिळेल. भक्ती म्हणजे सक्ती नव्हे! कृपया त्या बायाबापड्यांचा विचार करा.’

वर्षांनुवर्षं प्राध्यापकी करताना मला पहाटे उठून कामावर जावं लागे. त्यामुळे रात्रीचे सणसमारंभ मी टाळले. दिवाळी पहाटेचा संगीत कार्यक्रम संगीत कलेची इतकी आवड असूनही मी कधी ऐकायला गेलो नाही. फटाक्यांमुळे कानठळ्या बसत असताना व कानात कापूस असताना गाणी कशी एन्जॉय करणार? माझा टिव्हीही त्यावेळी बंदच असतो! पोषाखीपणा मला आवडत नाही. त्यामुळे ‘झगमगत’ कुठे जाणं मी टाळतो.

सणउत्सवांपासून दूर राहिल्यामुळे माझं काही नुकसान झालं का? मला तसं अजिबात वाटत नाही. रोजचे वाचन, लेखन, प्रसिद्धी हाच माझा शक्ती देणारा सण आहे. मंगेश पाडगावंकरांचं एक आवडतं पुस्तक मी जपून ठेवलंय. त्या काव्यसंग्रहाचं नावच मुळी ‘उत्सव’ आहे. असा निवांत एकांतातला शांत, सुंदर उत्सव मला मानवतो.

हल्ली प्रदूषण टाळण्यासाठी सुशिक्षित लोक सणाच्या मोसमात घरापासून दूर, पर्यटनाला, प्रवासाला जातात. त्यांच्याकडे पैसा आहे. आम्ही काय करावं? एखादा रसिक मित्र ते दोन चार दिवस मला आसरा देतो. त्याचा बंगला गोंगाटापासून दूर असतो. ‘पुरूष उवाच’सारखे दिपावली विशेषांक मात्र सणाच्या निमित्तानेच प्रकाशिक होतात. हाच एकमेव आनंद!

भरला पापाचा घडा

कथा * संजीव जामकर

हॅलो पप्पा, माझं कॅम्पस सिलेक्शन झालं आहे.’’ ऐश्वर्या जवळजवळ ओरडतच फोनवर बोलत होती. तिचा आनंद ओसंडून वाहत होता.

‘‘अरे व्वा! अभिनंदन पोरी…कोणत्या कंपनीत झालंय?’’ पप्पांचाही आवाज आनंदानं ओथंबला होता.

‘‘रिव्होल्यूशन टेक्नोलॉजीमध्ये. खूप मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. बऱ्याच देशात शाखा आहेत या कंपनीच्या.’’ ऐश्वर्या आनंदानं सांगत होती. ‘‘कॉलेजमध्ये सर्वात जास्त पॅकेज मलाच मिळालंय. बहुतेकांना तीन ते साडे तीन लाखांचं पॅकेज मिळालं आहे, मला मात्र साडे चार लाखांचं पॅकेज दिलंय…पण?’’

‘‘पण…पण काय?’’

‘‘पप्पा, कंपनी दोन वर्षांचा बॉन्ड करून घेते आहे…मला समजत नाहीए…मी हो म्हणू की नको?’’

‘‘अगं, इतर कंपन्याही एक वर्षाचा बॉन्ड तर मागवतातच ना? चांगली सुरूवात होतेय तर दोन वर्षांचा बॉन्ड भरायला काहीच हरकत नाहीए. कारण दोन वर्षांनंतर कंपनी बदलावीशी वाटली तर तुला यापेक्षा वरचा जॉब मिळेल ना? उलट तुझ्या बरोबरीच्या मुलांना त्यावेळी जेमतेम तेवढा पगार मिळेल ज्यावर तू आज सुरूवात करते आहेस.’’ पप्पांनी समजावलं.

‘‘थँक्यू पप्पा, तुम्ही माझी काळजी दूर केलीत.’’

ऐश्वर्या लखनौच्या इंजिनियअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी होती. प्रत्येक सेमिस्टरला टॉप करायची. सगळ्यांनाच तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक होतं. तिलाच सर्वात जास्त पॅकेज मिळणार हेही सर्व जाणून होते.

दोन दिवसांनी घरी पोहोचली, तेव्हा आईनं औक्षण करून तिचं स्वागत केलं. बाबांनी तिला जवळ घेऊन आशिर्वाद दिला. ‘‘तुला पोस्टिंग कुठं मिळेल?’’ आईनं विचारलं.

‘‘बंगळुरूला.’’

घरात एखाद्या सणा उत्सवाचं वातावरण होतं. त्या आनंदात सुट्या कधी संपल्या समजलंही नाही. ऐश्वर्या जेव्हा कंपनीत जॉईन झाली तेव्हा तिथली भव्यता बघून चकित झाली. बंगळुरूच्या आयटी हबमध्ये एका मल्टी स्टोरीड बिल्डिंगच्या सहाव्या माळ्यावर कंपनीचं आलिशान ऑफिस होतं.

सकाळी दहा वाजता कंपनीतले सर्व कर्मचारी मिनी ऑडिटोरियममध्ये पंधरा मिनिटं मेडिटेशन करायचे. त्यानंतर सर्व आपापल्या डिपार्टमेंटला निघून जायचे. ज्यूनिअर कर्मचाऱ्यांसाठी हॉलमध्ये लहान लहान क्यूबिकल्स होती. मॅनेजर आणि इतर वरच्या ऑफिसर्ससाठी केबिन्स होती. सर्व क्यूबिकल्स अन् केबिनची सजावट एकारखीच होती. त्यावरून कंपनीच्या ऐश्वर्याचा अंदाज करता येत होता.

ऐश्वर्याचं काम प्रोजेक्ट मॅनेजर सुशांतच्या टीममध्ये होतं. सुशांतची गणना कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये व्हायची. आपल्या योग्यतेमुळेच त्यानं फार लवकर इतकी वरची जागा मिळवली होती.

पहिल्याच दिवशी त्यानं ऐश्वर्याचं स्वागत करत म्हटलं होतं, ‘‘ऐश्वर्या, आमच्या टीममध्ये तुझं स्वागत आहे. माझी टीम कंपनीची लीड टीम आहे. कंपनीचे सर्वात महत्त्वाचे प्रोजेक्ट या टीमला मिळतात. मला खात्री आहे, तुझ्या येण्यामुळे आमची टीम अधिक बळकट होईल.’’

‘‘सर, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.’’ ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर शालीन आत्मविश्वास झळकत होता.

सुशांत खरंच बोलला होता. कंपनीचे महत्त्वाचे प्रोजेक्ट त्यांच्याच टीमला मिळत होते. अर्थातच इतरांच्या मानानं या टीमच्या लोकांना मेहनतही अधिक करावी लागत होती. बघता बघता नोकरीचा एक महिना संपलासुद्धा. या काळात ऐश्वर्याला फार काम दिलं गेलं नाही पण तिला कामाचं स्वरूप, कामाची पद्धत समजून घेता आली. खूप काही शिकायला मिळालं.

पहिला पगार मिळताच तिनं पंचवीस हजार रूपयांची खरेदी केली आणि विमानाचं तिकिट काढून ती घरी लखनौला पोहोचली.

‘‘मम्मा, ही बघ बंगलोर सिल्कची साडी अन् पश्मिता शाल…तुझ्यासाठी.’’

आईच्या खांद्यावर साडी ठेवत ती म्हणाली, ‘‘बघ किती छान दिसतेय तुला.’’

मम्मा खूप खुश झाली. खरंच साडी अन् शाल सुंदरच होती.

‘‘पप्पा, हा तुमच्यासाठी सूट आणि हे घडयाळ…’’ दोन पाकिटं बाबांना देत तिनं म्हटलं.

सूट पप्पांच्या आवडीच्या रंगाचा होता. घड्याळही एकदम भारी होतं. त्यांचाही चेहरा खुलला.

‘‘केवढ्याला गं पडलं हे सगळं?’’ शालवरून हात फिरवत आईनं विचारलं.

‘‘फार नाही गं! पंचवीस हजार रूपये खर्च झाले.’’ हसून ऐश्वर्याने म्हटलं.

ऐकून आईचे डोळे विस्फारले…‘‘अन् आता सगळा महिना कसा काढशील?’’

‘‘जसा आधी काढत होते…पप्पा झिंदाबाद,’’ खळखळून हसंत ऐश्वर्यानं म्हटलं.

‘‘बरोबर आहे. अजून माझ्या रिटायरमेंटला अवकाश आहे. मी माझ्या लेकीला सहज पोसू शकतो.’’ बाबाही हसत म्हणाले.

दोन दिवस राहून ऐश्वर्या परत कामावर रूजू झाली. दुसऱ्याच दिवशी तिच्या सिनिअरनं लंच नंतर तिला एक टास्क करायला दिला. ऐश्वर्या मन लावून काम करत होती पण टास्क पूर्ण झाला नव्हता. सात वाजून गेले होते. बरेचसे एम्प्लॉई घरी निघून गेले होते. ती काम करत बसली होती.

‘‘ऐश्वर्या मॅडम, अजून घरी गेला नाहीत तुम्ही?’’ आपल्या चेंबरमधून बाहेर पडलेल्या सुशांतची नजर ऐश्वर्यावर पडली.

‘‘सर, एक टास्क होता. अजून पूर्ण झाला नाहीए. पण मी करेन…’’

‘‘मला बघू देत. काय आहे ते कळेल.’’ सुशांतनं म्हटलं.

ऐश्वर्या कॉम्प्युटर समोरून बाजूला झाली. सुशांतनं काही क्षण स्क्रीनवर ओपन असलेल्या प्रोग्रॅमकडे बघितलं अन् मग त्याची बोटं सराईतपणे की बोर्डवर काम करू लागली.

पाच सात मिनिटातच सुशांत हसत बाजूला झाला. ‘‘हा घ्या तुमचा टास्क पूर्ण झाला.’’

किती वेळ ऐश्वर्या जे काम करत बसली होती ते सुशांतनं इतक्या कमी वेळात पूर्ण केलं होतं. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी तिच्या मनात आदर व कौतुक दाटून आलं.

‘‘थँक्यू सर,’’ अत्यंत कृतज्ञतेनं तिनं म्हटलं.

‘‘त्याची गरज नाहीए,’’ मंद स्मित करत त्यानं म्हटलं, ‘‘त्यापेक्षा माझ्याबरोबर एक कप कॉफी घेणार का?’’

ऐश्वर्याही दमलीच होती. तिलाही गरम चहा किंवा कॉफीची गरज होती. तिनं लगेच होकार दिला.

सुशांतनं तिला एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. हॉलमध्ये बरीच गर्दी होती. पण वर टेरेसवरही बसायची सोय होती. तिथं गर्दीही बेताची होती. वातावरण शांत होतं. टेरेसवरून बाहेरचं दृश्यही दिसत होतं. शहरातले दिवे बघून तारे जणू पृथ्वीवर उतरले आहेत असं वाटत होतं.

‘‘ऐश्वर्या, कंपनीतर्फे दोन इंजिनिअर्सना अमेरिकेला पाठवायचं आहे. तू त्यासाठी अप्लाय का केलं नाहीस?’’ कॉफीचा घोट घेत सुशांतनं विचारलं.

‘‘सर, मी अजून अगदीच नवी आहे ना, म्हणून मी अप्लाय केलं नाही.’’

‘‘प्रश्न नवं किंवा जुनं असण्याचा नाहीए, प्रश्न हुशारीचा, टॅलेंटचा आहे. आणि प्रामाणिकपणा अन् हुशारी तुझ्यात आहेच. तू अप्लाय करायला हवंस. तीन लाख रूपये दर महिन्याला, शिवाय कंपनीतर्फे बोनस…एक वर्षांनंतर परत आल्यावर तुझी मार्केटव्हॅल्यू केवढी वाढलेली असेल विचार कर.’’ सुशांत शांतपणे तिला समजावून सांगत होता.

‘‘पण सर, तरीही मी खूप ज्यूनिअर आहे, माझ्याहून सीनियर्सही आहेत. तरी माझी निवड होईल?’’

‘‘त्याची काळजी करू नकोस. हा प्रोजेक्ट माझा आहे. कोणाला अमेरिकेला पाठवायचं, कोणाला नाही, हा निर्णय माझा असेल.’’

ऐश्वर्याला लगेच निर्णय घेता येईना. ती विचार करत होती.

कॉफी संपवून सुशांतनं म्हटलं, ‘‘घाई नाहीए. नीट विचार करून सांग. उद्या सायंकाळी आपण इथंच भेटूयात. त्यावेळी तुझा निर्णय सांग.’’

ऐश्वर्या घरी आली. शांतपणे विचार केला तेव्हा तिला जाणवलं की ही संधी चांगली आहे. सहा महिन्यात पप्पा आता रिटायर होतील. तिचं पॅकेज जरी वर्षांला साडेचार लाखाचं होतं तरी हातात सध्या फक्त तीस हजार रूपये येत होते. एवढ्यात तिचं जेमतेम भागत होतं, घरी पाठवायला पैसेच उरत नव्हते. तिनं ठरवलं अमेरिकेची संधी घ्यायचीच.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी ती जेव्हा रेस्टॉरंटच्या गच्चीवर पोहोचली, तेव्हा सुशांत तिची वाट बघत उभा होता. मंद आवाजात वाद्यसंगीत वाजत होतं. फारच प्रसन्न सायंकाळ होती.

ऐश्वर्यानं जेव्हा अमेरिकेला जायला तयार असल्याचं सांगितलं, तेव्हा सुशांत म्हणाला, ‘‘योग्य निर्णय घेतला आहेस तू. तिथून परतल्यावर तुझ्या करिअरला अधिकच झळाली मिळेल. मी प्रयत्न करेन…आपली सहयोगी कंपनी तुझ्या राहण्याचीही सोय करेल.’’

हे ऐकल्यावर तर ऐश्वर्याचा चेहरा एकदम खुलला. अमेरिकेत राहण्याचा खर्च फार येतो हे ती ऐकून होती. मग तर एका वर्षांत ती बराच पैसा वाचवू शकली असती. तिनं कृतज्ञतेनं म्हटलं, ‘‘सर, तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय, त्याची परतफेड मी कशी करेन तेच मला कळत नाहीए.’’

‘‘मनात आणलंस तर तू आजही करू शकतेस.’’ सुशांतने म्हटलं.

‘‘कशी?’’ नवल वाटून ऐश्वर्याचे टपोरे डोळे अधिकच विस्फारले.

‘‘असं बघ, हे जग ‘गिव्ह अॅन्ड टेक’च्या फॉर्मुल्यावर चालतं. टीचर विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा तो फी घेतो. डॉक्टर रोग्यावर उपचार करतो तेव्हा तो पैसे घेतो, अगदी आईवडिलही मुलाला वाढवतात, तेव्हा म्हातारपणी त्यानं आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा असतेच. सरकार जनतेसाठी ज्या सोयी, सुविधा, सेवा पुरवते त्याचा मोबदला टॅक्सरूपात घेतेच. एकूणात या जगात फुकटात काहीही मिळंत नसतं.’’ सुशांत एखाद्या तत्त्वत्याप्रमाणे बोलत होता. ऐश्वर्या फार गोंधळली होती…तिला समजेना काय नेमकं सांगताहेत सुशांत सर. तिनं चाचरत विचारलं, ‘‘म्हणजे मला काय करावं लागेल?’’

‘‘फक्त काही दिवसांसाठी माझी हो. मी तुला करिअरच्या अशा उंचीवर पोहोचवेन की लोकांना तुझा हेवा वाटावा,’’ सुशांतनं थेट तिच्या डोळ्यात बघत म्हटलं.

सगळी गच्ची आपल्या भोवती फिरतेय असं वाटलं ऐश्वर्याला. कॉलेजात कायम तिनं टॉप केलं होतं. पण इथं तिच्या बुद्धिचं अन् योग्यतेचं महत्त्वच नव्हतं. ती फक्त एक यादी होती. तारूण्याचा सौदा करत होता सुशांत. फक्त देह व्यापाराचा एक सुसंस्कृत प्रस्ताव समोर ठेवून अपमान जिव्हारी लागला होता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

‘‘ऐश्वर्या, मी बळजबरी करत नाहीए. ही एक ऑफर आहे. तुला कबूल असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. कंपनीतल्या तुझ्या पोझिशनला काहीही धक्का लागणार नाही. तू नेहमीप्रमाणेच आपलं काम करत राहशील.’’ अत्यंत मृदू अन् गोड शब्दात सुशांतनं म्हटलं.

‘‘क्षमा करा सर, तुम्ही मला समजण्यात चूक केलीत. मी विकाऊ नाही.’’ अश्रू कसेबसे थोपवत ऐश्वर्या उठून उभी राहिली.

‘‘अरे? उठलीस का? निदान कॉफी तर घे,’’ एक शब्दही न बोलता ऐश्वर्या तिथून निघाली ती सरळ आपल्या फ्लॅटवर पोहोचली. घरी येऊन मात्र तिचा बांध फुटला. तिला रडू आवरेना, नोकरीतल्या यशासाठी शॉटकट घेणाऱ्या अनेक मुलींबद्दल तिनं ऐकलं होतं. पण तिलाही त्या परिस्थितीचा सामना करावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता पुढे काय? इथं काम करणं जमेल का? सुशांत या गोष्टीचा वचपा म्हणून तिच्यासाठी अडचणींचा डोंगर उभा करेल…तर मग नोकरी सोडायची का?…पण तिनं तर दोन वर्षांचा बॉन्ड करून दिलाय…

त्या रात्री ती जेवली नाही. झोपही लागली नाही. काय करावं ते कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती घाबरतच ऑफिसला पोहोचली. तिला वाटलं होतं सुशांत तिला फैलावर घेईल. पण त्याची वागणूक अगदी नॉर्मल होती. जणू काही घडलंच नव्हतं.

आठवडाभर ऐश्वर्या भेदरलेलीच होती. पण मग नॉर्मल झाली. तिला वाटलं, सुशांतला आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला असावा. नंतर एक दिड महिना गेला. सगळंच आलबेल होतं.

एक दिवस सुशांतने तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावून म्हटलं, ‘‘ऐवर्श्या, अमेरिकेतले हे आपले खास क्लाएंट आहे. त्यांचा हा जरूरी प्रोजक्ट आहे. अठ्ठेचाळीस तासात पूर्ण करायचा आहे. करू शकशील?’’

‘‘मी पूर्ण प्रयत्न करते सर.’’

‘‘गुड! हे कंपनीचे खास क्लाएंट आहेत, त्यामुळे कुठंही काहीही चूक व्हायला नको हे लक्षात ठेवायचं.’’ सुशांतनं सांगितलं.

‘‘ओके सर,’’ म्हणत ऐश्वर्या आपल्या सीटवर येऊन बसली. तिनं आधी तो प्रोजेक्ट पूर्ण वाचला तेव्हा तिला वाटलं, हे तर सोपं आहे. ती सहजच पूर्ण करू शकेल.

ऐश्वर्यानं काम सुरू केलं, पण तिचा अंदाज चुकला. जसजशी ती प्रोजेक्टवर पुढे जात होती तसतसा तो अधिकच क्लिष्ट होत होता. दुपारपर्यंत ती फारसं काही करू शकली नाही. अठ्ठेचाळीस तासात हे काम पूर्ण होणार नाही याची तिला जाणीव झाली.

लंचनंतर ती सुशांतला या संदर्भात विचारायला गेली, पण तो कुठल्या तरी मिटिंगसाठी बाहेरगावी गेला होता. तो दुसऱ्याच दिवशी येणार होता म्हणून कळलं. तिनं इतर सिनियर्सशीही बोलून बघितलं, पण या क्लाएंटचा असा प्रोजेक्ट कुणीच केलेला नसल्यानं कुणीच तिला मदत करू शकलं नाही.

दुसऱ्या दिवशी ऑफिसात आल्या आल्या सुशांतनं तिचं काम बघितलं, अन् तो भडकलाच, ‘‘काय हे? तू काहीच काम केलं नाहीए? मी नव्हतो ऑफिसात तर हातावर हात ठेवून बसून राहिलीस?’’

‘‘तसं नाही सर, यात काही प्रॉब्लेम आले. मी इतर सिनियर्सना विचारलं, पण कुणीच सांगू शकलं नाही. शेवटी मी क्लांयटलाही दुपारी फोन लावले, पण त्यांनी उचलला नाही.’’ ऐश्वर्यानं तिची अडचण सांगितली.

‘‘ऐश्वर्या, शुद्धीवर आहेस का तू?’’ सुशांत केवढ्यांदा ओरडला. ‘‘अगं, शिकलेली, आयटी कंपनीत नोकरी करणारी तू. तुला एवढंही कळू नये? तू जेव्हा फोन करत होतीस तेव्हा अमेरिकेत रात्र होती अन् त्यावेळी लोक झोपलेले असतात. नशीब म्हणायचं की त्याची झोपमोड झाली नाही, नाही तर तुझी नोकरीच गेली असती.’’

‘‘पण सर, मी काय करायचं?’’ ऐश्वर्याला आपल्या हतबलतेमुळे रडूच फुटलं.

‘‘आपलं डोकं वापरायचं आणि काम पूर्ण करायचं.’’ सुशांत संतापून म्हणाला. मग त्यानं प्रोजेक्टबद्दल तिला काही सूचना केल्या अन् तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला.

ऐश्वर्यानं शर्थ केली पण प्रोजेक्ट त्या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही. सुशांतनं तिला मेमो दिला.

हळूहळू सुशांतचा खरा रंग दिसायला लागला. तो मुद्दामच सर्वात कठिण टास्क ऐश्वर्याला द्यायचा. कमी वेळात तो पूर्ण व्हायला हवा म्हणायचा. अन् काम पूर्ण      झालं नाही तर सरळ मेमो हातात द्यायचा. शिवाय अत्यंत अपमानास्पद भाषा वापरून रागवायचा.

एक दिवस ऑफिसात गेल्या गेल्याच ऐश्वर्याला त्यान बोलावून घेतलं, ‘‘तीन महिन्यात अकरा मेमो मिळालेत तुला. कामात सुधारणा झाली नाही तर कंपनी तुम्हाला डिसमिस करू शकते. ही शेवटची संधी आहे.’’

अपमानित ऐश्वर्या आपल्या सीटवर येऊन बसली. जर बोलल्याप्रमाणे तिला खरोखर डिसमिस केलं गेलं तर तिला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणं अशक्य होऊन बसेल. त्यापेक्षा आपणच राजिनामा दिला तर? पण तिनं तर दोन वर्षांचा बॉन्ड भरून दिलाय. नोकरी सोडली तर तिला कंपनीला पाच लाख रूपये द्यावे लागतील. तीन महिन्यांनी पप्पा रिटायर होतील. इतकं असहाय्य वाटलं ऐश्वार्याला…डोळयांत पाणीच आलं तिच्या.

‘‘काय झालं गं ऐश्वर्या? इतकी उदास का आहेस? कसली काळजी वाटतेय?’’ स्नेहानं तिच्या खांद्यावर हात ठेवत आपलेपणानं विचारलं. हल्ली त्यांची चांगली मैत्री झाली होती.

ऐश्वर्याला बोलावसं वाटलं…पण काय सांगणार? तिच्या डोळयातून टपटप अश्रू वहायला लागले.

‘‘इथं नको, कॅन्टीनमध्ये बसूयात.’’ स्नेहानं हात धरून तिला सीटवरून उठवलीच.

स्नेहानं तिला त्यांच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये न नेता दुसऱ्या मजल्यावरच्या एका कॅन्टीनमध्ये नेलं. सकाळची वेळ असल्यामुळे तिथं गर्दी नव्हती. स्नेहानं खोदून खोदून विचारल्यावर ऐश्वार्या हुंदके देत सगळी हकिकत सांगितली. स्नेहाचा चेहरा संतापानं लाल झाला.

‘‘याचा अर्थ हा चांडाळ, हा घृणित खेळ तुझ्याबरोबरही खेळतोय.’’ दात ओठ खात तिनं म्हटलं.

‘‘ ‘तुझ्या बरोबरही’चा काय अर्थ?’’ दचकून ऐश्वार्यनं विचारलं.

‘‘अगं, त्यानं मलादेखील अमेरिकेला जाण्याची लालूच दिली होती. मी नकार दिल्यानंतर गेले दोन महिने मलाही छळतोय.’’ स्नेहानं सांगितलं.

विचार करत ऐश्वर्या बोलली, ‘‘याचा अर्थ ज्या दोघी मुली अमेरिकेला गेल्या आहेत, त्यांनी याची अट मान्य…’’ ऐश्वर्यानं वाक्य पूर्ण करण्याआधीच त्वेषानं स्नेहा बोलली, ‘‘त्यांचं खरं खोटं त्या जाणोत. पण या माणसाचं सत्य आपल्याला ठाऊक आहे. याला धडा शिकवायलाच हवा, नाहीतर हा नेहमीच नव्या मुलींना खेळणं समजून त्यांच्या चारित्र्याशी खेळत राहील.’’

‘‘पण…पण आपण काय करू शकतो?’’

स्नेहानं कॉफी घेता घेता तिच्या डोक्यातली योजना ऐश्वर्याला समजावून सांगितली. सगळा बारीक सारीक तपशील नीट समजून घेतला गेला. त्यानंतर दोघी पुन्हा आपल्या ऑफिसात आल्या.

त्यानंतर लंचच्या थोड्या आधी ऐश्वर्या सुशांतच्या चेंबरमध्ये गेली. ‘‘सर, थोडं बोलायचं आहे.’’

‘‘अं?’’

‘‘सर, मला या ऑफिसात काम करणं जमत नाहीए.’’

‘‘तर?’’

‘जर अजूनही शक्य असेल तर मी अमेरिकेला जायला तयार आहे, तुम्ही मदत केलीत तर मोठीच कृपा होईल.’’

‘‘शक्य, अशक्य सगळं माझ्याच हातात आहे, पण तिथं जाण्याची अट तुला माहीत आहे…ती मान्य असेल तर बघ…’’ सुशांतनं तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हटलं.

‘‘सर, इतक्या घाईत मी सांगू शकणार नाही…पण आज सायंकाळी तुम्ही माझ्या फ्लॅटवर याल का? तोपर्यंत मी अजून नीट विचार करून तुम्हाला निर्णय सांगेन.’’

‘‘ओ के बेबी, बरोबर आठ वाजता मी पोहोचतो.’’ आपला आनंद लपवत सुशांतनं म्हटलं.

कसाबसा तो दिवस ऐश्वर्यानं रेटला. सायंकाळी घरी आली. स्नान करून सुंदर साडी नेसली. मेकअप केला. तिचं हृदय धडधडत होतं पण निर्णय पक्का होता.

बरोबर आठ वाजता दाराची बेल वाजली. तिनं दार उघडलं. दारात सुशांत उभा होता. त्यानं आत येऊन दार लावून घेतलं अन् ऐश्वर्याकडे बघून म्हणाला,

‘‘साडीत सुंदर दिसते आहेस तू?’’

ऐश्वर्यानं काहीच उत्तर दिलं नाही. तिच्याजवळ जात सुशांतनं म्हटलं, ‘‘आजची रात्र एकदम स्पेशल, संस्मरणीय कर. मी तुला नक्की अमेरिकेला पाठवतो.’’

ऐश्वर्यानं अंग चोरून घेतलं. तिचं गप्प राहणं म्हणजे तिची स्वीकृती समजून सुशांतची हिम्मत वाढली. त्यानं तिला पटकन मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं.

कसंबसं स्वत:ला सोडवून घेत तिनं म्हटलं, ‘‘सर, हे काय करताय तुम्ही?’’

‘‘तुझं करीयर घडवाचंय ना? त्याची तयारी.’’

पुन्हा तिला मिठीत घेत त्यानं तिचं चुंबन घ्यायचा प्रयत्न केला.

‘‘करियर घडवताय की आयुष्य नासवताय?’’ संतापून ऐश्वर्यानं विचारलं.

‘‘ऐशू, इतक्या जवळ आल्यावर आता मागे फिरता येणार नाही. तुझ्या प्रोबेशन पिरियड संपता संपता मी तुला प्रमोशन पण देतो…फक्त जे घडतंय ते घडू दे.’’ सुशांत आता चांगलाच पेटला होता.

‘‘घडूही दिलं असतं…पण…’’

‘‘पण काय?’’

‘‘जर या लॅपटॉपचा वेब कॅमेरा ऑन नसता तर,’’ ऐश्वर्यानं टेबलावरच्या लॅपटॉपकडे बोट दाखवलं.

लॅपटॉप बघताच सुशांतनं दचकून उडीच मारली. जणू समोर मोठ्ठा साप बघितला असावा. त्यानं घाबरून विचारलं, ‘‘कॅमेरा ऑन आहे?’’

‘‘फक्त ऑनच नाहीए. तर या कॅमेऱ्यातील सर्व गोष्टी दूर कुठं तरी रेकॉर्डही होत आहेत.’’ ऐश्वर्या शांतपणे म्हणाली.

सुशांत प्रचंड घाबरला, ‘‘रेकॉर्डिंग होतंय?’’

‘‘होय सर, तुम्हा सारख्यांना फक्त स्त्रीचं शरीर दिसतं. तिची बुद्धी, तिची श्रम करण्याची तयारी, तिची योग्यता यांची काहीच किंमत नसते का? तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, तेवढाच आम्हीही केलाय. तुम्ही नोकरीत पुढे जाता पण आम्ही जाऊ म्हटलं तर आम्हाला अब्रूची किंमत द्यावी लागते. पण आता तसं होणार नाही. तू आता आमचं शोषण करू शकणार नाहीस. तुला तुझ्या दृष्टकृत्याची किंमत मोजावीच लागेल.’’ ऐश्वार्यानं म्हटलं.

सुशांतचा चेहरा पांढराफटक झालेला. त्यानं घाईनं लॅपटॉप बंद केला.

‘‘एवढ्यानं काही होणार नाही. अजून एक छुपा कॅमेरा सगळं चित्रण करतोय. तुझ्या पापाचा घडा भरलाय सुशांत.’’

‘‘अजून एक कॅमेरा?’’ सुशांत प्रचंड घाबरला होता.

‘‘तुझ्यासारख्या विषारी सापांपासून सावध राहायला त्याची गरज होतीच ना?’’ तिरस्कारानं हसत ऐश्वयानं म्हटलं, ‘‘तुझी नोकरी आता संपली आजच हे रेकॉर्डिंग कंपनीच्या चेयरमेनकडे पोहोचवलं जाईल.’’

‘‘असं करू नकोस, अगं, माझी लहान लहान मुलं आहेत. त्यांचं आयुष्य मातीमोल होईल. माझी पत्नी रस्त्यावर येईल.’’ हात जोडून सुशांत गयावया करत होता.

‘‘कंपनीतला स्टाफही खरं मुलांसारखाच असतो. आमची नाही दया आली?’’

‘‘प्लीज, प्लीज मला क्षमा कर. माझ्या पत्नीला हे कळलं तर ती आत्महत्त्या करेल…’’ सुशांतनं अक्षरश: ऐश्वर्याचे पाय धरले.

ज्या सर्वशक्तीमान सुशांतसमोर कंपनीचा स्टाफ घाबरून असायचा तोच आज ऐश्वर्याच्या पायावर लोळण घेत होता.

तिरस्कारानं त्याच्याकडे बघत ऐश्वर्यानं म्हटलं, ‘‘मला किंवा कुणालाच यापुढे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं धाडस करू नका, पण जे केलंय त्याची शिक्षा भोगावीच लागेल.’’

‘‘माझी नोकरी गेली तर त्याची शिक्षा माझ्या कुटुंबाला भोगावी लागेल. त्यांच्यासाठी मला क्षमा कर. मी वचन देतो यापुढे मी अजिबात अशी वागणूक ठेवणार नाही. म्हणंत असशील तर कंपनी सोडून जातो.’’

ऐश्वर्यानं काही उत्तर देण्याआधीच तिचा मोबाइल वाजला. फोन नेहाचा होता. तिनं मोबाइल ऑन करून स्पीकरवर टाकला. नेहाचा आवाज ऐकू आला. ‘‘ऐश्वर्या, तो बरोबर बोलला. त्याच्या दृष्कृत्याची शिक्षा त्याच्या बायकोमुलांनी का भोगावी? त्यांचा काय दोष आहे? मी सर्व रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवलंय. गरज पडल्यास त्याची वापरही करू. पण सध्या त्याला एक संधी द्यायला हवी.’’

‘‘ठीक आहे.’’ ऐश्वर्यानं मोबाइल बंद केला. त्याच्याकडे बघत तिनं म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुझ्या पापाची फळं तुझ्या कुटुंबाला भोगावी लागू नयेत म्हणून आम्ही सध्या पुढली अॅक्शन घेत नाहीए. मात्र यापुढे सावध राहा.’’

‘‘धन्यवाद! खूप खूप धन्यवाद…मी उद्याच या कंपनीचा राजिनामा देतो.’’

‘‘त्याची गरज नाही. उलट तू इथं आमच्या डोळ्यांपुढेच असायला हवा. आमची नजर असेल तुझ्यावर…आणि मी आता तुझ्या बरोबर काम करणार नाही. तू आपली टीम बदल. काय कारण द्यायचं ते मॅनेजमेंटला दे,’’ ऐश्वर्यानं कडक आवाजात तंबी दिली.

सुशांतला बदलत्या काळातल्या स्त्री शक्तीचा अंदाज आला होता. आता तो स्त्री शक्तीला कमी लेखणार नव्हता. थकलेल्या पावलांनी त्यांने आपल्या घराचा रस्ता धरला.

गैरसमज

कथा * सुवर्णा पाटील

आज नोकरीचा पहिला दिवस. रियाने सकाळीच सर्व आवरले व ऑफिसला निघाली. वडिल वारल्यानंतर घराची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती. इंजिनिअरिंग कॉलेजला नेहमी टॉपवर राहणाऱ्या रियाची खुप मोठी मोठी स्वप्ने होती, पण परिस्थितीमुळे तिला हा मार्ग स्वीकारावा लागला. आधी करत असलेल्या लहान नोकरीत तिच्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण होत नव्हत्या. त्यातच एके दिवशी ऑनलाईन मुलाखतीच्या जाहिरातीने तिचे लक्ष वेधून घेतले. तिने त्याप्रमाणे फॉर्म भरला व तिची त्या कंपनीत निवड झाली.

रिया ऑफिसात आली, तेव्हा ऑफिसातील काही स्टाफ नुकताच आलेला होता. तिथेच रिसेप्शनला बसलेल्या अंजलीने रियाला विचारले, ‘‘गुड मॉर्निंग मॅडम, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे?’’

‘‘नाही, माझी या कंपनीत ऑनलाईन मुलाखतीतून निवड झाली आहे. मला आज हजर होण्यासाठी बोलवले आहे. हे लेटर…’’

‘‘ओ.. असे होय.. अभिनंदन! तुमचे आपल्या कंपनीत स्वागत आहे. तुम्ही थोडा वेळ इथे बसा. मी मॅनेजर साहेबांशी बोलून पुढच्या सूचना देते.’’

रिया तिथेच बसून कंपनीचे निरीक्षण करू लागली. त्याचवेळेस कंपनीत बऱ्याच ठिकाणी असलेल्या आर. जे. या लोगोने तिचे लक्ष वेधून घेतले. तेवढयात अंजली आली, ‘‘मॅडम तुम्ही मॅनेजर साहेबांकडे जा ते तुम्हाला पुढची प्रोसेस समजावून देतील.’’

‘‘अंजली मॅडम, एक प्रश्न विचारू का? कंपनीत जागोजागी आर.जे. हा लोगो कशासाठी आहे?’’

‘‘आर. जे. लोगो म्हणजे आपल्या कंपनीचे सर्वेसर्वा श्री मुजुमदार साहेब यांच्या एकुलत्या एक चिरंजीवांच्या नावाची आद्याक्षरे आहेत. खरं म्हणजे ऑनलाईन मुलाखत ही त्यांचीच कल्पना होती. आज त्यांचाही कंपनीचा पहिलाच दिवस आहे. चला, आता आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ.’’

‘‘हो नक्कीच, चला.’’

कंपनीचे मॅनेजर ही जेष्ठ व्यक्ती होती. त्यांच्या बोलण्याच्या आणि काम समजावण्याच्या पद्धतीवरून रियाच्या मनावरील बराचसा ताण हलका झाला. तिने सर्व समजून घेतले व कामास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही दिवसातच रियाने स्वत:च्या हसतमुख स्वभावाने व कामाच्या तत्परतेने सर्वांना आपलेसे करून घेतले. पण अजूनही तिची कंपनीचे मालक आर. जे. सरांशी भेट झाली नव्हती. कंपनीची मिटींग असो वा कोणताही प्रसंग, ज्यात तिची भेट त्यांच्याशी होऊ शकत होती, त्यात तिला टाळले जायचे. हे तिच्यासाठी एक गुढच होते.

एके दिवशी नेहमीच्या फाईल बघत असताना शिपायाने निरोप दिला, ‘‘तुम्हाला मॅनेजर साहेबांनी बोलावले आहे.’’

‘‘या, रिया मॅडम. तुम्हाला कामाबद्दल काही सुचना द्यायच्या आहेत. आज तुम्हाला या कंपनीत येऊन किती दिवस झाले?’’

‘‘का, काय झाले सर? माझे काही चुकले का?’’

‘‘चुकले असे नाही म्हणता येणार. पण तुम्ही तुमच्या कामाची गती वाढवा आणि हो, या ठिकाणी आपण काम करण्याचा पगार घेतो, गप्पा मारण्याचा नव्हे. यापुढे लक्षात ठेवा, या आता.’’

रिया खुपच दुखावली गेली. खरंतर मॅनेजर साहेब कधीही तिच्याशी या पद्धतीने बोलले नव्हते. पण ती काहीच बोलू शकली नाही. ती तिच्या जागेवर परत आली.

थोडयाच वेळात शिपायाने तिच्या विभागाच्या सर्व फायली तिच्याकडे दिल्या ‘‘यात ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्या आजच्या आजच पूर्ण करून घ्या असे साहेबांनी सांगितले आहे.’’

‘‘पण हे काम एकाच दिवसात कसे पूर्ण होईल.’’

‘‘ते मला माहिती नाही. पण मोठया साहेबांनी असेच सांगितले आहे.’’

‘‘मोठे साहेब….?’’

‘‘अहो मॅडम, मोठे साहेब म्हणजे आपले आर. जे. साहेब, तुम्हाला माहिती नाही का?’’

आता रियाला सर्व परिस्थिती लक्षात आली. तिने केलेल्या कामात आर. जे. सरांनी चूका काढल्या होत्या. खरंतर ती अजून त्यांना भेटलीसुद्धा नव्हती. मग ते असे का वागत होते हा प्रश्न रियाला सतावत होता.

तिने मनातील सर्व विचार झटकले आणि कामाला सुरुवात केली. ऑफिसची वेळ संपत आली तरी रियाचे काम सुरूच होते. तिने एकदा मॅनेजर साहेबांना विचारले, पण त्यांनी काम आजच पूर्ण करावे अशी सक्त ताकीद दिली. बाकी सर्व स्टाफ घरी निघून गेला होता. आता ऑफिसमध्ये फक्त रिया, शिपाई आणि आर. जे. सरांच्या केबिनचा लाईट सुरू होता म्हणजे तेसुद्धा ऑफिसमध्ये होते. काम पूर्ण करत रियाला बराच वेळ झाला.

त्या दिवसानंतर रियाला जवळ जवळ प्रत्येकच दिवशी जास्तीचे काम करावे लागत होते. तिची सहनशीलता संपत होती. तिने एके दिवशी निश्चय केला, ‘आज जर मला नेहमीप्रमाणे जादा काम मिळाले तर सरळ आर. जे. सरांना भेटायचे.’ आणि झालेही तसेच. तिला आजही कामासाठी थांबावे लागणार होते. तिने काम थांबवले व ती आर. जे. सरांच्या केबीनकडे जाऊ लागली. शिपायाने तिला अडवले, पण ती सरळ केबिनमध्ये शिरली.

‘‘सॉरी सर, मी तुमची परवानगी न घेता तुम्हाला भेटायला आले. पण आपण मला सांगू शकाल का नक्की माझे कोणते काम तुम्हाला चुकीचे वाटते? नक्की मी कुठे चुकत आहे? ते एकदाचे सांगून टाका म्हणजे मी त्याप्रमाणे वागत जाईन पण…वारंवार…असे….’’

रियाचे पुढील शब्द तोंडातच राहिले. कारण रिया केबीनमध्ये आली, तेव्हा आर. जे. सर खुर्चीवर पाठमोरे बसले होते. त्यांनी सुरूवातीचे रियाचे वाक्य ऐकून घेतले व त्यांची खुर्ची आता रियाकडे वळली.

‘‘सर…. तुम्ही….तू….. राज… कसे शक्य आहे?…तू इथे कसा?…’’ रियाला आश्चर्या मोठा धक्काच बसला. ती आता तिथेच कोसळून पडेल असे तिला वाटत होते.

‘‘ हं बोला रिया मॅडम, काय अडचण आहे तुम्हाला?’’ राजच्या या रुक्ष प्रश्नाने ती भानावर आली व काही न बोलता केबिनच्या बाहेर निघून गेली. तिचा भूतकाळ असा अचानक तिच्यासमोर येईल अशी तिने कल्पनाही केली नव्हती.

आर. जे. सर म्हणजे दुसरे कोणी नसून तिचा खूपच जवळचा मित्र राज होता. त्या मैत्रीच्या नात्यात प्रेमाचे धागे कधी विणले गेले हे दोघांच्याही लक्षात आले नाही. रियाला कॉलेजातील पहिला दिवस आठवला. कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळच सिनिअर मुलांच्या टोळक्याने तिला अडवले.

‘‘या मॅडम, कुठे चाललात? कॉलेजातील प्रत्येक नवीन विद्यार्थाने आपली ओळख करून द्यायची असते मगच पुढे जायचे.’’

रिया प्रथमच तिच्या गावातून शिक्षणासाठी इथे शहरात आली होती आणि आल्याआल्या कॉलेजमधील या प्रसंगाला सामोरं जाताना ती खुपच घाबरून गेली.

‘‘अरे हिरो ,तू कुठे चालला? तुला दिसत नाही इथे ओळख परेड सुरू आहे. चल, असे कर या मॅडम जरा जास्तच घाबरलेल्या दिसत आहेत. तू त्यांना प्रपोज कर म्हणजे त्यांचीही भीती जाईल.’’

नुकताच आलेला तरुण या प्रसंगाने थोडाही बावरला नाही. त्याने लगेच रियाकडे पाहिले. एक स्मितहास्य दिले व म्हणाला. ‘‘हाय…मी राज…घाबरू नकोस. बडे बडे शहरो में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं.’’ राजच्या या फिल्मी स्टाईलचे रियालाही हसू आले.

‘‘आज आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. या वर्षा ऋतूच्या साक्षीने माझ्या मैत्रीचा स्वीकार करशील.’’ रियाच्या तोंडून अनपेक्षितपणे होकार कधी आला हे तिलाही समजले नाही. पण तिच्या होकाराबरोबर सिनिअर टोळक्याने एकच जल्लोष केला.

‘‘वाह, क्या बात है! खरा हिरो शोभतोस. तुझ्याकडून प्रेमाचे धडे घ्यावे लागतील.’’

‘‘नक्कीच, केव्हाही…

रियाकडे एक कटाक्ष टाकून राज केव्हा कॉलेजच्या गर्दीत नाहीसा झाला हे तिच्या लक्षातच आले नाही. एका कॉलेजात, एका वर्गात असल्याने त्यांची वारंवार भेट होत असे. राज हा त्याच्या स्वभावामुळे सर्वांमध्ये प्रिय होता. कॉलेजातील सर्व मुली त्याच्याशी बोलण्यासाठी झुरत. पण राज मात्र दुसऱ्याच नात्यात अडकत होता. ते नाते होते रियाबरोबर जुळलेले अबोल नाते. तिचा शांत स्वभाव, तिचे निरागस रूप ज्याला शहरीपणाचा जराही लवलेश नव्हता. तिचे हेच वेगळेपण राजला तिच्याकडे ओढत होते.

एके दिवशी दोघे जण कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलेले होते, तेव्हा राजने विषय काढला, ‘‘रिया तू किती वेगळी आहेस ना! आपल्या कॉलेजचे तिसरे वर्षे सुरू झाले. पण तुला इथले लटके फटके अजूनही जमत नाही…’’

‘‘मी आहे तशीच चांगली आहे. शिवाय मी कॉलेजला शिकण्यासाठी आले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मला नोकरी करून माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांनी माझ्यासाठी खुपच कष्ट घेतले आहेत.’’

रियाचे बोलणे ऐकून राजला तिच्याबद्दल प्रेमाबरोबरच आदरही वाटू लागला. तिसऱ्या वर्षाच्या शेवटच्या पेपरला राजने रियाला सांगितले, ‘‘मला तुला महत्त्वाचे सांगायचे आहे. संध्याकाळी भेटू या.’’ खरंतर त्याचे डोळेच सर्व सांगत होते. रियासुद्धा या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. ती त्याच आनंदात होस्टेलला आली पण तेवढयात मेट्रनने सांगितले, ‘‘तुझ्या घरून फोन होता. तुला तातडीने घरी बोलवले आहे.’’

रियाने लगेच बॅग भरली व गावाकडे निघाली. घरी काय झाले असेल या विचाराने तिला हैराण केले होते. या सर्व गोष्टीत ती राजबद्दल विसरूनच गेली. घरी गेल्यावर समोर वडिलांचे प्रेत, त्या आघाताने बेशुद्ध पडलेली आई आणि रडणारा लहान भाऊ. नक्की कोणाला धीर देऊ, स्वत:च्या भावनांना कसे सांभाळू हेच तिला समजत नव्हते. एका अपघातात तिचे वडील जागच्या जागी वारले होते. तिच मोठी असल्याने तिने स्वत:च्या भावना गोठवून टाकल्या व पुढचे सर्व सोपस्कार पार पाडले.

या प्रसंगानंतर तिने शिक्षण अर्ध्यावरच सोडले आणि लहानशी नोकरी पत्करून घराची जबाबदारी घेतली.

इकडे राज मात्र पूर्ण बिथरून गेला. तो पूर्ण रात्र रियाची वाट बघत होता. पण ती आलीच नाही. त्याने कॉलेज होस्टेलमध्ये सगळीकडे तपास केला, पण त्याला तिचा काहीच पत्ता लागला नाही. रियानेच तशी सोय करून ठेवली होती. तिला राजवर ओझे बनायचे नव्हते. पण राज यापासून अनभिज्ञ होता. तो खुपच दुखावला गेला असल्याने त्यानेही ते कॉलेज सोडले. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला निघून गेला.

‘‘मॅडम, तुमचे काम झाले का? मला ऑफिस बंद करायचे आहे. मोठे साहेबही गेले केव्हाचे…’’

‘‘शिपायाच्या बोलण्याने रिया वर्तमानात आली. तिने सर्व आवरले व घरी निघाली. तिच्या मनात तोच विचार सुरू होता, ‘मी राजचा गैरसमज कसा दूर करू? त्याला माझे म्हणणे पटेल का? ही नोकरी नाही सोडता येणार… काय करावे…’ या विचारातच तिने पूर्ण रात्र जागून काढली.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अंजलीने रियाला रिसेप्शनवरच हटकले, ‘‘काय गं रिया…काय झाले? तुझे डोळे असे का दिसत आहेत? बरी आहेस ना..’’

‘‘काही नाही गं, थोडा थकवा आला आहे, बस्स. तू सांग आजचे काय शेड्युल?..’’

‘‘अगं, आपल्या कंपनीला ते मोठे प्रोजेक्ट मिळाले ना म्हणून उद्या सर्व स्टाफसाठी आर. जे. सरांनी पार्टी ठेवली आहे. प्रत्येकाला त्या पार्टीत यावेच लागेल.’’

‘‘हो…येईन ना…’’

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ठरलेल्या वेळी पार्टी सुरू झाली. रिया फक्त हजेरी लावून लगेच निघणार होती. राजचे पूर्ण लक्ष रियाकडे होते, तेवढयात त्याला एक परिचित आवाज आला.

‘‘हाय राज…तू इकडे कसा? किती दिवसांनी भेटलास तू …आहे अगदी तसाच आहे. पण तुझे नेहमीचे हसू कोठे आहे…?’’

‘‘अगं ,हो…हो…किती प्रश्न विचारशील. स्नेहल तूसुद्धा नाही बदललीस गं. कॉलेजला होतीस तशीच आहेस. प्रश्नांची खाण… तू मला सांग तू इथे कशी…?’’

‘‘अरे, मी माझ्या पतीसोबत आली आहे. आज त्यांच्या आर. जे. सरांनी सर्व स्टाफला कुटुंबासोबत बोलवले होते. म्हणून मी आले. तू कोणासोबत आला आहेस?’’

‘‘मी एकटाच आलो आहे. मीच आहे तुझ्या पतिचा आर.जे. सर.’’

‘‘काय सांगतोस राज, तू तर मला आश्चर्याचा धक्काच दिला. अरे हो, आता आठवले…रियासुद्धा याच कंपनीत आहे ना. तुमचे सर्व गैरसमज दूर झाले तर…’’

‘‘गैरसमज, कोणता गैरसमज…?’’

‘‘अरे रिया अचानक कॉलेज सोडून का गेली, तिच्या वडिलांचा अपघातात झालेला मृत्यू ,हे सर्व..’’

‘‘काय.. मला हे माहितीच नाही.’’

स्नेहल रिया व राजची कॉलेजमधील मैत्रीण होती. ती त्या दोघांमधील मैत्री, प्रेम, दुरावा या सर्व प्रसंगांची साक्षीदार होती, पण तिला नंतर रियाबद्दल सर्व समजले. तिने ते राजला सांगितले.

राजला ते ऐकून खुप वाईट वाटले. आपण रियाबद्दल किती गैरसमज करून घेतला. खरंतर तिची यात काहीच चूक नव्हती. त्याची नजर पार्टीत रियाला शोधू लागली. पण ती तोपर्यंत निघून गेली होती.

तो तिला शोधण्यासाठी बस स्टॉपकडे पळाला.

पावसाळयाचे दिवस असल्याने रिया एका झाडाच्या आडोश्याला उभी होती. त्याने दुरूनच तिला आवाज दिला

‘‘रिया….रिया…..’’

‘‘काय झाले सर? तुम्ही इथे का आलात? तुमचे काही काम होते का?’’

‘‘नाही गं, सर नको म्हणू. मी तुझा पूर्वीचा राजच आहे. मला आताच स्नेहलकडून सर्व समजले. मला माफ कर रिया…’’

‘‘नाही नाही, राज तुझी यात कोणतीही चूक नाही. ती परिस्थितीच तशी होती.’’

‘‘रिया, आज पुन्हा या वर्षा ऋतूच्या साक्षीने मी तुला विचारतो…माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का?’’

रियाच्या आनंदाअश्रूंनी राजला त्याचे उत्तर दिले.

आणि राजने तिला आपल्या मिठीत घेतले. त्यांच्या या मिलनाला पावसानेही साथ दिली. त्या पावसाच्या धारांमध्ये त्यांच्यामधील दुरावा, गैरसमज अलगद वाहून गेला.

योग्य अयोग्य

कथा * अर्चना पाटील

रावसाहेब हे गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. लक्ष्मी ही त्यांची एकूलती एक कन्या. लक्ष्मी एकदम देखणी होती. कोणालाही ती आपल्या सुंदरतेचा आणि गोड गोड बोलण्याचा वापर करून सहज आपल्या जाळयात ओढून घ्यायची व कोणाकडूनही आपले काम बरोबर काढून घ्यायची. तशी लक्ष्मी एक सद्गुणी व संस्कारी मुलगी होती. रावसाहेबही आपल्या कन्येसाठी सलग दोन वर्षापासून वरसंशोधन करत होते. लक्ष्मीच्या सुंदरतेमुळे व रावसाहेबांच्या श्रीमंतीमुळे स्थळांची काही कमी नव्हती. काही मुले लक्ष्मीला आवडायची नाहीत तर काही रावसाहेबांना. त्यामुळे लक्ष्मीच्या लग्नाचे घोडे पेंड खात पडले होते.

काही दिवसांपूर्वी गावात एक तरुण डॉक्टर आला होता. रावसाहेब नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात गेले असता दोघांची गाठभेट झाली. पहिल्या भेटीतच तो तरुण डॉक्टर सुरेश रावसाहेबांच्या मनात भरला. मग काय विचारता रावसाहेबांनी सुरेशची पूर्ण कुंडलीच काढायला सुरूवात केली. शक्य होईल तिकडून त्याच्याबद्दल माहिती मिळवली आणि एक दिवस आपल्या मुलीसाठी ते थेट सुरेशच्या गावी जाऊन पोहोचले. सुरेशच्या आईचा उषाताईंचा या स्थळाला विरोध होता. श्रीमंतांच्या घरची मुलगी होती, आपल्या कुटुंबाशी जुळवून घेईल की नाही ही शंका उषाताईंना येत होती. सुरेशला रावसाहेबांचा गावातील नावलौकीक माहिती असल्याने त्याने लक्ष्मीला न पाहताच मी लग्न करेन तर याच मुलीशी करेन असे घरातील जेष्ठ मंडळींना सांगून टाकले.

अखेरीस एका चांगल्या मुहूर्तावर गावातच रावसाहेबांनी आपल्या कन्येचा विवाह थाटामाटात पार पाडला. विवाहानंतर सुरेश आपल्या व्यवसायाला आधिक वेळ देऊ लागला. सुरेशने रावसाहेबांची मदत घेऊन त्याच गावात एक मोठा दवाखाना उघडला. दवाखान्याची सुरूवात असल्याने सुरेशचा अधिकाधिक वेळ दवाखान्यातच जाऊ लागला. लक्ष्मी दिवसभर घरी एकटीच राहत असे. सुरेशचा पाहिजे तितका वेळ तिला उपलब्ध होत नसे. अगदी रात्री दोघे झोपणार तेवढयात सुरेशचा फोन खणखणायचा. ताबडतोब सुरेश बेडरूममधून बाहेर जाऊन नर्सला फोनवर सुचना द्यायचा. पंधरा वीस मिनीटांनी त्याच्या सुचना संपल्या की तो बेडरूममध्ये शिरायचा. पुन्हा लक्ष्मीशी गुलूगुलू गप्पा मारायला सुरुवात करायचा. पण त्या पंधरा वीस मिनीटात लक्ष्मीचा मुड ऑफ होऊन जायचा.

लक्ष्मीला कितीही राग आला तरी तो व्यक्त करण्याची संधीदेखील तिला उपलब्ध नव्हती. कारण तिने वेळीअवेळी येणाऱ्या फोनबाबत तक्रार केल्यास सुरेशचे  उत्तर तयार असे. ‘आता फोनवरही तुला विचारूनच बोलत जाऊ का?’ लक्ष्मीला संताप का येतो याचा जराही विचार न करता उलट रात्रभर तिच्याशी वादविवाद करायचा. सकाळ झाली की पुन्हा नव्याने सुरुवात करून स्वत: कामावर निघून जायचा. लक्ष्मी मात्र रात्रभर त्याने बोललेल्या वाक्याचाच विचार करत राहायची.

सुरेश कधीकधी प्रॅक्टीससाठी परगावीही जात असे. त्याचे जाणे निश्चित नसे. कधीही फोन आला की त्याला त्वरित निघावे लागे. सुरेश परगावी गेला की कामात इतका गुंग होऊन जायचा की त्याला लक्ष्मीला फोन करायलाही वेळ नसायचा. लक्ष्मीने स्वत:हून फोन केला की तिकडून उत्तर यायचे, ‘मी कामात आहे. नंतर फोन कर. मी बाहेर आहे. नंतर फोन कर.’ तो संतापात असेल तर, ‘काय आहे? कशाला फोन केलास?’ फोनवर आलेल्या या प्रत्युत्तरांमुळे लक्ष्मीने सुरेशला फोन करणेच सोडून दिले. सुरेशला फोन करायचा म्हणजे लक्ष्मीला संकटच वाटे. त्याचा मुड तर चांगला असेल ना, तो नीट तर बोलेल ना हेच प्रश्न तिला सारखे भंडावून सोडत. लक्ष्मीने फोनच केलेला नसेल आणि तशातच एखाद्या केसमुळे सुरेश त्रस्त असेल तर तो स्वत:चे नैराश्य झटकण्यासाठी लक्ष्मीलाच फोन करीत असे. ‘कशी बायको आहेस तू? साधा एक फोनसुद्धा करत नाही. तुला माझी चिंताच नाहीए.’ संतापात अशी चारपाच वाक्ये ताडताड लक्ष्मीला बोलून तो फोन ठेवून देत असे. त्याच्या त्या आक्रमक स्वभावामुळे लक्ष्मीची बोलतीच बंद होत असे.

लग्नाअगोदर कोणालाही एक शब्दही न बोलू देणारी लक्ष्मी केव्हा गुंगी गुडीया झाली हे तिचे तिलाही समजले नाही. सुरेश कामासाठी सकाळी आठला निघाला की रात्री आठलाच परत येई. घरी आल्यानंतरही त्याचे फोनवरच बोलणे चालू असे. लक्ष्मीला आपण त्याच्यासोबत का राहतो आहे हेच समजत नव्हते. सुरेश रात्री झोपण्यापूर्वी लक्ष्मीशी खूप गोड बोलत असे. रात्र संपताच सुर्योदयाबरोबर त्याचे विचारचक्र नवीनच फिरत असे. एके दिवशी सकाळीच लक्ष्मीने भांडणाला सुरूवात केली.

‘‘तुम्ही माझ्यासोबत अजिबात वेळ व्यतीत करत नाही. मला आता कंटाळा आला आहे या घरात एकटे राहण्याचा.’’

‘‘माझा नाईलाज आहे. हे बघ, एकतर तू पुस्तक वाचत बस किंवा माहेरी जाऊन ये. तुला थोडे बरे वाटेल.’’

अशावेळी लक्ष्मीकडे मुळूमुळू रडण्याशिवाय पर्यायच राहत नसे. सुरेश नेहमीच प्रँक्टीससाठी परगावी गेला की लक्ष्मीला माहेरी सोडून देत असे. लक्ष्मी तिच्या वडिलांच्या घरी आहे म्हणजे आनंदातच असणार असा विचार करून तो तिला चार पाच दिवस फोनच करायचा नाही. इकडे लक्ष्मीचा जीव त्याचा आवाज ऐकण्यासाठी व्याकूळ व्हायचा. पण तो नीट बोलेल की नाही या भीतिने लक्ष्मी फोनच करत नसे. सुरेशच्या कामाच्या व्यापात व लक्ष्मीच्या मुकेपणात संसाराची तीन वर्षे पार पडली तरी लक्ष्मीला मुलबाळ होण्याची चिन्हे दिसत नव्हती. मूलबाळ होत नसल्याने सासूबाई लक्ष्मीला पाण्यात पाहत होत्या. सासुबाईंच्या रागीट स्वभावामुळे लक्ष्मीला सुरेशच्या मुळ गावी जाणे नकोसे वाटायचे. सासरी जायचे म्हणजे तिला आठ दिवस अगोदरच टेन्शन यायचे. सासरी घरात पाय पडल्यापासून ते उंबरठा ओलांडेपर्यंत उषाताईंचा तोंडाचा पट्टा बंद होत नसे. माहेरी लाडात वाढलेली लक्ष्मी सासरी बैलाप्रमाणे कामाला जुंपलेली असे. सकाळी पाचला उठणे, सडा टाकणे, पाणी भरणे, फरश्या पुसणे, घर झाडणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे अशी अनेक कामे करता करता लक्ष्मीच्या नाकी नऊ येत असत.

माहेरी आणि स्वत:च्या घरी कामाला नोकर असल्याने लक्ष्मीला घरकामाची सवय नव्हतीच. पण सासूबाईंच्या पुढे तिचे काहीच चालत नसे. सासरी तर सुरेश लक्ष्मीला आईच्या धाकामुळे पाहतच नसे. त्याचा घरात पायच टिकत नसे. सासरी या दाम्पत्याचे बोलणेदेखील दुरापास्त होत असे.

‘‘हे बघ सुरेश, तू लवकरात लवकर दुसरी बायको कर. मला माझ्या घराला वंशाचा दिवा पाहिजे.’’ आईचा तगादा सुरू असे.

‘‘बघू. आता आम्हाला जाऊ दे.’’

आता तर सुरेश लक्ष्मीपासून अधिकच दूरदूर राहू लागला. लक्ष्मीची सहनशीलताही आता संपली. सुरेशच्या जीवनात स्वत:ला गुंतवून घेतांना तिचे स्वत:चे अस्तित्वच नष्ट झाले. एकेदिवशी लक्ष्मीचा वाढदिवस होता. ती माहेरी होती. सकाळपासून वाट पाहून थकली आणि तिने सुरेशला फोन केला.

‘‘आज आम्ही केक आणला होता.’’

‘‘कशासाठी?’’

हे उत्तर ऐकून लक्ष्मी रागाने लाल झाली. काही मिनीटांनी त्वरित त्याने कारणांची यादी सुरू केली. मी सकाळी इथे होतो. दुपारी मित्रांसोबत होतो. त्यामुळे फोन करायची आठवणच राहीली नाही. सुरेशच्या मनात लक्ष्मीविषयी प्रेम तर होते पण तो कधी व्यक्तच करत नसे. नेहमीची कारणे ऐकून लक्ष्मी संतापात बडबड करू लागली.

‘‘हे बघ लक्ष्मी तुसुद्धा माझा वाढदिवस लक्षात ठेवू नको. पण कटकट करू नको.’’

या घटनेने लक्ष्मी सुन्न होऊन गेली. ती आता या पिंजऱ्यात राहू इच्छित नव्हती. दोन तीन दिवसानंतर सुरेश नेहमीप्रमाणे कामाला गेला. लक्ष्मीनेही घर सोडले. माहेरी तिला जायचे नव्हते. रात्र होईपर्यंत ती सरळ रस्त्याने चालतच राहिली. शेवटी रात्रीच्या अंधारात थकून एका बसस्थानकावर बसली. तेथे दोन स्त्रिया उभ्या होत्या. एक स्त्री गाडीत बसून निघून गेली. दुसरी रूबीना होती. तिला घेऊन जाणारे कोणीच आले नाही. रूबीनाचे लक्ष लक्ष्मीकडे गेले. ती लक्ष्मीला तिच्यासोबत खोलीवर घेऊन गेली. दोनच दिवसात लक्ष्मीही तिच्यासारखी बसस्थानकावर जाऊन उभी रहायला लागली.

रोज नवीन कस्टमर, नवे हॉटेल्स, नवनवीन गिफ्ट्स. काहीवेळा आठदहा दिवसांची टूरही होत असे. काही ग्राहकांशी तिचे आता ऋणानुबंधपण जोडले गेले. लक्ष्मीच्या आजारपणातदेखील कस्टमर लोक तिला मदत करीत. लक्ष्मी ज्या ग्राहकाकडे जायची त्याचे मन आपल्या वाणीने, नृत्याने जिंकून घ्यायची. नवीन आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण होत होत्या पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी सुरेशसाठी खुपच तिरस्कार होता.

सुरेशमुळे तिचे आयुष्य उद्धवस्त झाले. त्याचे काम आणि त्याच्या आईचे नेहमीच त्याला लक्ष्मीपासून दूर करण्याचे प्रयत्न या गोष्टींचा तिला उबग आला होता. सर्वच माणसे काही वेळा मन मारून जगत असतात. पण परिस्थिती काहीवेळा मनावर इतका दबाव टाकते की ते मन आपली नेहमीची जागा सोडून कुठेही उडते, कोणत्याही दिशेने, कितीही वेगाने. चांगले वाईट याचा विचार न करता. तसेच लक्ष्मीचे झाले होते.

सुरेश लक्ष्मी निघून गेली, त्यादिवशी संध्याकाळी घरी पोहोचला. घराचा दरवाजा उघडा होता. तो तसाच घरात शिरला. सोफ्यावर बसला. लक्ष्मी पाणी घेऊन येईल या विचाराने पाच मिनीटे तेथेच पहुडला. पण घरात लक्ष्मीचा बिलकूल आवाज येत नव्हता. सुरेशने सगळया घरात एक चक्कर टाकली. लक्ष्मी कुठेच दिसली नाही. गेली असेल कुठेतरी… येईल परत थोडयावेळाने… या विचाराने तो सोफ्यावरच झोपला.

पहाटे सहा वाजताच त्याचे डोळे उघडले. अजूनही लक्ष्मी आली नव्हती. त्याने लगेच रावसाहेबांना फोन केला. पण ती माहेरीही नव्हती. सुरेश सर्व गावात एक चक्कर टाकून आला. सुरेशला पोलीस स्टेशनमध्ये जायचे नव्हते, कारण सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न होता. सलग दोन महिने वैयक्तिक स्तरावर त्याने लक्ष्मीची शोधाशोध केली पण त्याचा नाईलाज झाला.

आता दवाखान्यातून घरी आल्यावर ते घर त्याला खायला उठू लागले. रात्री बिछान्यावर झोपताना तर त्याला तिची प्रकर्षाने आठवण यायची. कोणाशी फोनवर बोलून झाले की त्वरित तो बेडरूममध्ये लक्ष्मीला पहायला जायचा, पण तेथे कोणीच नसायचे.

लक्ष्मी कुठे गेली असेल, कोणासोबत पळून गेली असेल, छे! छे! लक्ष्मी असे   कधीच करणार नाही याबाबत त्याला ठाम विश्वास होता. पण त्याची आई मात्र   लक्ष्मीबाबत ती पळूनच गेली असेल अशी शंका व्यक्त करत होती. त्यामुळे सुरेश व आईत भांडण होऊ लागले. शेवटी सुरेशने कामाच्या ठिकाणी मन गुंतवायचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाचा जीवाला जीव देणारा जोडीदार पाहिला की त्याला लक्ष्मीची आठवण यायची.

सुरेश आता लक्ष्मीच्या आठवणीत रमू लागला. त्याचे कामात लक्ष नसे. गर्दीतही तो भ्रमिष्टासारखा बसून राहत असे. सारखी चिडचिड करत असे. दवाखान्यात जाणे तर बंदच झाले. घरातच एकाच जागेवर तो बसून राहत असे. कोणाशी बोलणे नाही. खाणे पिणे नाही. केवळ लक्ष्मी लक्ष्मी हा एकच शब्द तो बोलत असे. थोडया दिवसातच त्याची रवानगी मनोरूग्णांच्या आश्रमात झाली.

काही वर्षांनी लक्ष्मीने जेव्हा सुरेशच्या बाबतीत माहिती मिळवली, तिला खूप वाईट वाटले. ‘‘मी खूप घाई केली की त्याने खूप उशीर केला. कोणास ठाऊक. मी केले ते योग्य होते की अयोग्य. कोणास ठाऊक,’’ या विचारांनी आजही तिचे मन दु:खी होते.

मारा गया बेचारा !

कथा * माधव गवाणकर

निखिल ड्रयव्हर असला तरी स्मार्टबॉय होता. आधी ‘हेवी’ वाहन चालवत होता, पण गावाकडून शहराकडे जाताना घाटरस्ते लागायचे. जागरण घडायचं. बॉडी उतरू लागली. मग बिपीनकडे ते काम सोपवून तो रीनाकडे नोकरीला लागला. तिचा आधीचा ड्रायव्हर व्यसनी होता. रीनाला निर्व्यसनी ड्रायव्हर हवा झाला. निखिल शाळेत असल्यापासून जिम करायचा. त्यामुळे तंदुरूस्त दिसायचा. त्याच्या चालण्यातला, बोलण्यातला रूबाबही रीनाला आवडला. तिचा नवरा आता परदेशात सेटल झाला होता. रीनालाही तिकडेच बोलावलं होतं. मात्र, निखिल तिला ‘मित्रासारखा’ वाटू लागल्यावर तिने त्यालाही परदेशी येऊन त्यांच्याबरोबर राहण्याची गळ घातली. ती त्याला लाडाने ‘निक’ म्हणू लागली. निकला पैशांची फार गरज होती. त्यामुळे घरच्या माणसांचा तसा विरोध असतानाही त्याने ती नोकरी स्वीकारली. ‘मी तीन वर्षांनी परत आलो की लग्न करतो, नक्की!’ असं आश्वासन घरी देऊन टाकलं. ‘निक’ नशीब वगैरे मानत नव्हता. अशी संधी परत मिळणार नाही याची त्याला कल्पना होती.

परदेशी गेल्यावर तिथले काही रहदारीचे वेगळे नियम त्याने जाणून घेतले. तिकडच्या भाषेतले शब्द व्यवहारापुरते शिकू लागला. आपला मुलगा दुसऱ्या देशात भरपूर कमाई करतो याचा गर्व हळूहळू इकडे त्याच्या गावातील आईलाही वाटू लागला.

हळूहळू रीना निखिलला लाडेलाडे नको ती कामं सांगू लागली. त्याच्या भरदार शरीराचं कौतुक करू लागली. ‘माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. शोभत नाही तो मला. कदाचित तो ‘गे’ असेल. कारण तरूण मुलांचे त्याला इंडियात असताना सारखे फोन यायचे. तू मला तो घरी नसताना ‘सुख’ दे, मला आता तूच नवऱ्यासारखा आहेस असं रीनाने स्पष्टच सांगितलं. निखिलच्या मनात अशी कोणतीही वाईट भावना नव्हती. शिवाय रीना त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. निखिलला आवडणारी एक मुलगी प्रथमी त्याच्या गावातच राहायची. तो भारतात आल्यावर तिलाच मागणी घालणार होता. तिचं कॉलेज शिक्षण सुरू होतं. रीनाला त्याने स्पष्ट नकार दिला. ती त्याच्याशी लगट करू लागताच तिला त्याने ‘मॅडम प्लीज असं करू नका. मी फक्त जॉबसाठी इथं आलोय,’ असं म्हणत मागे ढकळलं. त्यांची झटापट झाली. रीना त्याला बेडवर खेचत होती, पण तसा अत्याचार होण्यापूर्वीच निखिलने झटकन बेडरूमबाहेर पडून दाराला बाहेरून कडी घातली. रीना त्याला फार वाईट अपशब्द बोलत होती. ‘तू माझ्या नवऱ्याच्या लायकीचा आहेस. त्याच्याबरोबर झोप तू. तू पण गे आहेस. तुला लाज वाटत नाही…’ म्हणत रीना दारावर लाथा मारती होती. निखिलने झटपट मिळतील ते कपडे बॅगेत भरले. पगार नुकताच झाला होता म्हणून काही रक्कमच त्याच्याकडे होती. घर सोडून फोन स्विच ऑफ करून तो घराच्या बाहेर पडला, पण जाणार कुठे? आता त्याच्याकडे कार नव्हती. हॉटेलात जेवण तर मिळालं, पण रात्र कुठे काढणार? हॉटेलचे दर परवडणारे नव्हते.

निक रस्त्यावरच झोपला आणि त्या रीना मॅमची इच्छा आपण पुरवायला हवी होती का? नोकरी सोडावी लागली नसती असा विचार त्याच्या मनात आला. पहाटे पुन्हा रीनाकडे जायचं आणि माफी मागून तिची वासना भागवत ही दोन-तीन वर्षं काढायची असं त्यानं ठरवलं. आपण पिंजऱ्यातले पोपट झालो आहोत, आपले पंख छाटले गेले आहेत हे निखिलच्या लक्षात आलं.

 

मात्र, त्यानंतर रात्री उशिरा जे घडलं, ते दुस्वप्न असतं तर बरं झालं असतं असं निकला वाटलं. दारू प्यायलेलं एक टोळकं तिथे फिरत आलं. ते गुंड निखिलला लाथा मारून उठवू लागले. तो घाबरून उठून बसला. ‘तुम्ही परदेशी, परके लोक आमच्या देशात येता. त्यामुळे आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत,’ अशा अर्थाची भाषा व शिव्या त्यांनी सुरू केल्या. त्यांच्याकडे लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिक्स होत्या. त्यांनी निकला इतकी बेदम व अमानुष माराहण केली की तो रक्तबंबाळ होऊन कोसळला. कुणी त्याला पाणीही पाजलं नाही. गुंड निघून गेले. घायाळ अवस्थेत निखिलला पहाटेपूर्वीच मरण आलं.

आपल्या महान देशाबद्दल प्रचंड राग असलेले अनेक माथेफिरू जगात आहेत. त्यांच्यापैकी एका टोळीने काहीही गुन्हा नसलेल्या निकचा बळी घेतला. तो भारतीय होता हाच त्याचा गुन्हा.

रीनाच्या ‘सोन्याच्या पिंजऱ्यातून’ निसटलेला हा निखिल नावाचा पक्षी कावळ्यांनी बाहेरच्या आसमंतात घेरून मारावा तसा ठार मारला. अरेरे! ‘मारा गया बेचारा’ एवढंच आम्ही गावकरी म्हणालो. हळहळत राहिलो… निकच्या खिशातील आयकार्डवरील रीनाच्या पत्त्यावर त्याची डेड बॉडी आणण्यात आली. तेव्हा रीनालाही रडू कोसळलं. ‘तू माझं का ऐकलं नाहीस निक’ म्हणत ती अश्रू ढाळत राहिली…

प्रिये तुझ्याचसाठी

कथा * रमणी मोटे

हमीसारखंच कार्तिक अन् रोहिणीच्या वादाचं पर्यवसान भांडणात झालं. भांडण थांबवण्याचा उपाय म्हणून कार्तिक गप्प बसला अन् आपल्या खोलीत लॅपटॉप उघडून काम करू लागला.

रोहिणी खूपच उत्तेजित झालेली होती. भांडणाची खुमखुमी मिटलेली नव्हती. त्याच अवस्थेत तिनं काही वेळ हॉलमध्ये फेऱ्या मारल्या अन् एकाएकी ती घराबाहेर पडली.

गेटमधून बाहेर पडतेय तोवर वॉचमन धावत आला, ‘‘मॅडम, कुठं बाहेर निघालात. टॅक्सी मागवू का?’’

‘‘नको, मी जवळच जाऊन येतेय,’’ रोहिणीनं म्हटलं.

रात्रीचे दहा वाजले होते. पण कुलाब्याच्या रस्त्यांवर अजूनही भरपूर वर्दळ होती. दुकानंही उघडी होती. लोक खरेदी करत होते. हॉटेल्स अन् स्वीटमार्टमधूनही लोक गर्दी करून होते.

रोहिणीच्या मनात खळबळ माजली होती. हल्ली जेव्हा जेव्हा रोहिणीचं कार्तिकशी भांडण व्हायचं, तेव्हा विषय नेमका कार्तिकच्या कुटुंबावरच येऊन थांबायचा. कार्तिक त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मोठ्या तिघी बहिणी होत्या. आईवडिलांचा तो लाडका होता तसाच तिघी बहिणींचाही लाडका होता. ही पाच माणसं सतत त्याच्या कौतुकात मग्न असायची.

अर्थात त्याबद्दल रोहिणीची काही तक्रार नव्हती. पण कधीकधी तिला वाटायचं की तिचा नवरा अजूनही अगदी लहानसं बाळ आहे. तो स्वत:च्या मनानं काहीच निर्णय घेऊ शकत नाही. दिवसाकाठी एकदा तरी तो आई आणि बहिणींशी बोलतोच. त्याशिवाय त्याला चैन पडत नाही.

या गोष्टीवरून रोहिणी चिडते तेव्हा तो म्हणतो ‘‘बाबा गेल्यावर मीच त्यांचा आधार आहे. माझ्या जन्मापासून आई आजारी आहे. तिघी बहिणींनीच मला वाढवलं आहे. वडील गेल्यावर परिस्थिती फार बिकट होती. आईनं कसे ते दिवस काढले तिलाच ठाऊक! त्या ऋणातच राहतो मी.’’

तो असा भावनाविवश झाला की रोहिणी गप्प बसते. पण तिला एक गोष्ट समजत नाही…मुलांचं पालनपोषण, त्यांना वाढवणं हे आईबापांचं कर्तव्यच असतं. त्यांनी ते केलं तर त्यात त्यांचे उपकार कसे ठरतात? तिच्याही आईवडिलांनी तिला वाढवलंच ना? पण ती वाद घालत नाही. एरवी तिची कार्तिकबद्दल काहीच तक्रार नाही. तिचं त्याच्यावर प्रेम आहे. कार्तिकही तिच्यावर जीव टाकतो. तो अत्यंत सज्जन माणूस आहे. भरपूर कमवतो. पैशाली तोटा नाहीए. पण त्यांचं प्रेम इतर लोकांमध्ये विभागलं जातंय हेच तिचं दु:ख आहे.

जेव्हा त्यांचं लग्न झालं, तेव्हा कार्तिकनं तिला म्हटलं होतं, ‘‘तू माझा हृदय स्वामिनी आहेस, जिवाची जिवलग आहेस. तुला हवं तसं तू आपलं घर मांड, सजव, हवं तसं चालव…मी तर स्वत:लाही तुझ्या हवाली केलंय. पैसा ही भरूपर देईन. फक्त एकच विनंती आहे, मी माझ्या कुटुंबाशी फार बांधील आहे, गुंतलोय मी त्यांच्यात…आणि म्हणूनच मला वाटतंय की तू ही त्यांच्याशी चांगले संबंध ठेव. त्यांना मान दे, मी माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही आणि माझ्या बहिणींनाही दु:खी बघू शकत नाही.’’

रोहिणीला आठवलं, हनीमूनसाठी ती दोघं सिंगापूरला गेली होती. कित्ती कौतुक केलं होतं कार्तिकनं तिचं. ती अगदी तृप्त तृप्त झाली होती. खूप मजा केली. परतायच्या आदल्या दिवशी ती दोघं बाजारात फिरत असताना कार्तिक एका ज्वेलरी शॉपपाशी थबकला. ‘‘ये ना, इथं जरा बघुयात काय काय आहे.’’ त्यांन तिचा हात धरून दुकानांत प्रवेश केला.

मनातल्या मनात ती सुखावली…कार्तिक तिच्यासाठी दागिना खरेदी करतो बहुतेक.

दोघांनी मिळून बरेच दागिने बघितले. एक नेकलेस उचलून कार्तिकनं म्हटलं, ‘‘हा कसा वाटतोय?’’

‘‘वाह! हा तर फारच सुंदर आहे.’’ आनंदून तिनं म्हटलं.

‘‘तुला नक्की आवडलाय ना? आपल्या हनीमून ट्रिपची आठवण म्हणून घेतोय तुझ्यासाठी.’’ तो प्रेमानं म्हणाला.

‘‘कार्तिक, तुम्ही किती चांगले आहात…’’ ती भारावून बोलली.

‘‘पण खूप महाग आहे…’’

‘‘तू पैशांची काळजी करू नकोस आणि हे बघ, एक एक बरासा नेकलेस माझ्या तिघी बहिणींसाठीही पसंत कर. इथून परत गेल्यावर त्यांनाही माझ्याकडून गिफ्टची अपेक्षा असेलच ना?’’

मध्येच बहिणी आल्यामुळे रोहिणीला मनातून जरा रागच आला होता. पण तसं न दाखवता तिनं विचारलं, ‘‘आणि आईंसाठी?’’

‘‘आईसाठी छानशी शाल घेऊयात…’’ त्यानं म्हटलं.

भरपूर खरेदी करून ती दोघं परत आली. त्यानंतर प्रत्येक सणावारी तो बहिणींना काहीतरी भेटवस्तू पाठवायचाच. जेव्हा ऑफिसच्या कामानिमित्तानं त्याला परदेशी जावं लागायचं, तेव्हा त्याच्या भाचा, भाचींकडून त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची यादी आधीच घरी पोहोचलेली असे. त्याच्या माणसांनी काही म्हणायचा अवकाश की ती गोष्ट तो ताबडतोब करायचा.

खरं तर रोहिणीला याबद्दलही आक्षेप नव्हता. कार्तिक एका आयटी कंपनीत नोकरी करत होता. भरपूर कमवत होता. त्याचं काहीही करायला तो मुखत्यार होता. तिला खटकणारी बाब होती त्याचा वेळ. त्याचा मौल्यवान वेळ जो तिला फक्त स्वत:साठी हवा असायचा, तो वेळ कार्तिक त्याच्या कुटुंबीयांसाठी देत होता. त्याचा वेळ अन् त्याचं प्रेम यात तिला कुणाचाही वाटा नको होता. त्यावर फक्त तिचा अन् तिचाच हक्क आहे असं तिला वाटायचं.

आजचं भांडण त्यावरूनच तर झालेलं. लवकरच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस येणार आहे. रोहिणीच्या मनात होतं यंदा परदेशात कुठं तरी जाऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा. पण कसचं काय? तिच्या भिशी पार्टीतल्या दोन तीन बायका इटलीला जाऊन आल्या अन् सतत तिथली वर्णनं ऐकवतात…किती सुंदर आहे अन् त्यांनी किती मजा केली…ते ऐकून ऐकून रोहिणीचे कान किटले होते. तिच्या एक दोन मैत्रिणींचे नवरे अरबपती होते. त्या तर सतत पैसे खर्च करून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायच्या. रोहिणीला त्यांचा फार हेवा वाटायचा.

यंदा तिनं बऱ्याच शर्थीनं कार्तिकला तयार केलं होतं की ती दोघं इटलीला जातील. मनसोक्त पैसा खर्च करायचा, चैन चंगळ करूनच परतायचं.

मनातल्या मनात तिनं किती तरी वेळा चित्र रंगवलं होतं की फ्रेंच शिफॉनची देखणी साडी नेसून महागातल्या परदेशी परफ्यूमचा फवारा अंगावर मारून परदेशी चॉकलेटचा मोठा डब्बा हातात घेऊन ती भिशीपार्टींला गेली आहे…सगळ्या जणी मनातून खूप जळताहेत, हेवा करताहेत पण वरकरणी तिचं कौतुक करताहेत.

पण आज जेवण झाल्यावर जेव्हा तिनं हा विषय काढला, तेव्हा कार्तिक म्हणाला, ‘‘यावेळी बाहेर जाणं मला अवघडंच वाटतंय…’’

‘‘का?’’

‘‘अगं, सगळ्यात मोठी माझी शकुंतला अक्का…तिच्या थोरल्या मुलीचं लग्न ठरलंय ना? तुला सांगितलंही होतं मी…तर आजच सकाळी तिचा फोन आला की एवढ्यातच त्यांच्याकडे साखरपुडा समारंभ आहे आणि आपलं तिथं जाणं फारच गरजेचं आहे. शेवटी मीच एकुलता एक मामा आहे ना? मला पुढाकार घ्यायला हवा.’’

‘‘तुमच्या घरात तर सतत काही ना काही चालूच असतं.’’ ती जरा चिडून म्हणाली, ‘‘कधी कुणाचं बारसं, कुणाचा वाढदिवस, कुणाचं जावळ अन् काय न् काय!’’

‘‘अगं, लग्नाचा वाढदिवस तर दरवर्षीच येतो ना? लग्नं दरवर्षी होतात का? अक्कानं खूप बजावून अन् आग्रहानं बोलावलंय…कुठलीही सबब तिला चालणार नाहीए.’’

‘‘मला एक सांगा, आपण आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे कधी जगूच शकणार नाही का?’’

तिचा संताप बघून तो शांपतपणे म्हणाला, ‘‘डार्लिंग, अशी चिडू नकोस. अगं, मॅरेज एनव्हसरी साजरी करायला आपण पुढल्या वर्षी जाऊयात ना? आत्ताच ठरवं, कुठं जायचं. किती रहायचं…मी सगळं प्लॉनिग तुझ्यावर सोपवतो.’’

‘‘हो…हो…तर…फारच उपकार आहेत तुमचे. मी सगळा प्लॅन ठरवेन अन् तुमच्या बहिणीचा फोन आला की सगळंच ओम फस्स! सगळं सगळं कॅन्सल!!’’

‘‘अगं, नेहमी असं होतं का?’’

‘‘होतं…नेहमीच असं होतं…आमचं स्वत:चं म्हणून काही आयुष्य नाहीए आम्हाला.’’

‘‘तू उगीचच चिडते आहेस. तुला कधी काही कमी पडू दिलंय का मी? तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, तुझे सगळे हट्ट पुरवतो.’’

‘‘त्यात काय मोठंसं?… ते तर सगळेच नवरे करतात…पण तेच नवरे जे बायकोबरोबर खरोखर प्रेम करतात.’’

‘‘म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी तुझ्यावर प्रेम करत नाही?’’ कार्तिकनं रोहिणीच्या डोळ्यात रोखून बघत विचारलं.

‘‘वाटतं तर तसंच.’’

‘‘रोहिणी, हे मात्र तू अति करते आहेस. तुलाही ठाऊक आहे, माझं तुझ्यावरचं प्रेम बघून माझे मित्र मला चिडवतात, बायकोचा गुलाम म्हणतात.’’

‘‘ते असं म्हणतात? नवल आहे…इथं तर माझे कोणतंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. मी काही म्हटलं की ‘आता जमणार नाही?’ हेच मला ऐकवलं जातं…खरं तर तुम्हाला ‘आईचं बाळ’ किंवा ‘बहिणींचा आज्ञाधारक भाऊ’ म्हणायला हवं.’’

कार्तिक खळखळून हसला, ‘‘तू म्हणजे ग्रेट आहेस.’’ एवढं बोलून त्यानं रोहिणीला गालावर प्रेमानं थोपटलं अन् टीव्ही. ऑन केला.

रोहिणी अजूनही भुणभुणत होती. तिला हा विषय उद्यावर ढकलायचा नव्हता. जो काही निर्णय असेल तो आजच, आत्ताच व्हायला हवा. म्हणून पुन्हा तिनं विचारलं, ‘‘तर मग, काय ठरवलंय तुम्ही?’’

‘‘कशाबद्दल?’’ अगदी सहज आश्चर्यानं कार्तिकनं विचारलं.

‘‘हे घ्या! मघापासून मी काय बोलतेय? निरर्थक बडबड वाटली का तुम्हाला? आपण इटलीच्या टूरवर जातो आहोत की नाही?’’

‘‘सांगितलं ना, की यावेळी जरा अवघड आहे…तुमला माहीत आहे. मला सुट्टया फार कमी असतात. यावेळी लग्नाला जायला हवं. पुढल्या वर्षी इटली…अगदी नक्की!’’

‘‘अजिबात नाही…असली पोकळ आश्वासनं मला नको आहेत.’’

‘‘अगं, हे बघ, पुढल्या वर्षीही इटली तिथंच असणार आणि आपण दोघंही तिथं जाणार…’’

‘‘हो, आणि तुमचं कुटंबही इथंच असणार अन् त्यांचे काही तरी कार्यक्रमही मध्येच उपटणार!’’

‘‘कधी कधी तू फारच बालिशपणा करतेस…’’

‘‘हो, हो, आहेच मी मूर्ख, अक्कलशून्य, स्वार्थी, आप्पलपोटी, सगळे, सगळे दुर्गुण ठासून भरले आहेत माझ्यात.’’

‘‘यावेळी तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही. आत्ता तू संतापलेली आहेस, उद्या शांत डोक्यानं ठरवूयात. मी जरा माझं ऑफिसचं काम संपवतो.’’ एवढं बोलून कार्तिकनं त्याचा लॅपटॉप ऑन केला.

रोहिणीच्या मनासारखं न झाल्यामुळे ती धुमसत होती. थोड्याच वेळात ती घराबाहेर पडली.

अजूनही रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती. सिनेमा थिएटर दिसताच तिला वाटलं तिकिट काढून आत जावं, दोन तास मजेत जातील. पण तेवढ्यात विचार आला की ती घरात नाही हे बघून कार्तिक काळजी करेल. तिला शोधेल…इथे, तिथे फोन करेल…तिनं बेत बदलला. गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेनं चालू लागली.

खूप लोक समुद्रकाठी बसून गप्पा मारत वाऱ्याच्या झाळुकींचा आनंद उपभोगत होते. रोहिणीही तिथंच बसली. दृष्टी पार समुद्राच्या अंतावर स्थिरावली होती.

समुद्रात दोन तीन जहाजं नांगरून पडलेली…त्यांच्या वरचे दिवे समुद्राच्या पाण्यात विलोभनीय दिसत होते. रोहिणीला वाटलं, सरळ समुद्रात उडी घ्यावी. काही क्षणांत तिचं आयुष्य संपेल.

मग तिला मन:चक्षुसमोर दृष्य दिसलं. तिच्या निर्जीव देहाला कवटाळून कार्तिक आक्रोश करतोय. म्हणतोय, तू इतकी रागावशील, मला वाटलंच नव्हतं. मी तुझे म्हणणं मान्य केलं असतं तर तू मला अशी एकट्याला टाकून गेलीच नसतीस…

पण छे! जीव बीव नाही हं द्यायचा. अजून काहीच जग बघितलं नाही अन् एवढं काय घडलंय की जीव द्यावा? ठीक आहे, नवऱ्याशी भांडण झालंय, पण ते तर सगळ्याच नवरा बायकोत होतं, तो वैवाहिक जीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. कधी भांडण, कधी प्रेम, खरं तर तिच्या आयुष्यात प्रेम आणि सुखंच जास्त आहे. दु:ख खरं तर नाहीच, पण तिच्या आठमुठेपणामुळे ती दु:खी होते.

कधीकधी कार्तिकही अडून बसतोच ना? त्यावेळी तिला खूप राग येतो. त्यावेळी ती फार उत्तेजित होते…विचलित मन:स्थितीत तिला काय करावं ते समजत नाही. मग असं काहीबाही मनांत येतं. लग्नाला चार वर्षं झालीत. अजून मूलबाळ नाही…कदाचित त्यामुळेच तडजोड करणंही जमत नसेल…

विचारांच्या तंद्रीत किती वेळ गेला तिला कळलंच नाही. ती भानावर आली तेव्हा तिच्या जवळपासची सर्वच गर्दी ओसरली होती. आइस्क्रिम वगैरे विकणारेही आपापलं सामान आवरून निघून गेले होते. ताज हॉटेलसमोर होती थोडी वर्दळ…मेन गेटशी दरवाजात उभे होते.

आता रस्त्यावर भडक वेषभूषेतल्या बऱ्याच महिला दिसत होत्या. तंग कपडे, विचित्र हावभाव…तसल्याच असाव्यात त्या स्त्रिया.

थोड्या थोड्या वेळात गाडीतून लोक यायचे. कुणा एकी जवळ थांबायचे. भाव ठरला पटला तर ती स्त्री त्या गाडीत बसायची अन् निघून जायची. तो सगळा प्रकार बघून रोहिणीला गंमत वाटली.

तेवढ्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्यात तीन चार तरूण होते. कारच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून एकानं म्हटलं, ‘‘हाय ब्युटीफुल? एकटीच बसली आहेस? ये, आमच्या बरोबर…मजा करू, हिंडू फिरू?’’

रोहिणी दचकली…हे कॉलेज तरूण तिला वेश्या समजाहेत की काय?

हरामखोर…त्यांना एक सभ्य, कुलीन स्त्री अन् वेश्या यातील फरक कळू नये? शी, इथं थांबण्यात अर्थ नाही, घरी जायला हवं.

ती घाईनं चालू लागली. कार तिच्याजवळून फुरर्कन निघून गेली…अन् काही क्षणांतच माघारी वळून पुन्हा तिच्याजवळ आली.

‘‘ये ना डार्लिंग, तुला हॉटेलात नेतो, बीयर पिऊयात, नॉनव्हेज खाऊयात…तुला चायनीज आवडतं? चल, महागड्या हॉटेलात तुला जेवायला घालतो. आपण डान्स करू…ये ना,’’ पुन्हा एका तरूणानं खिडकीतून डोकं बाहेर काढत तिला म्हटलं.

तिनं संताप गिळून शांतपणे म्हटलं, ‘‘तुमचा गैरसमज झालाय, मी एक गृहिणी आहे. स्वत:च्या घरी निघालेय.’’

‘‘असं? तर मग तुला घरी सोडतो…कुठं राहतेस तू?’’

ती मुलं तिच्या चालण्याच्या स्पीडनंच कार चालवत होती. सतत तिच्याशी बोलत होती. रोहिणीच्या लक्षात आलं, या मुलांकडे पैसे नाहीएत…गाडीही बहुधा चोरलेली असावी. त्यांना फुकटात मिळेल तेवढी चंगळ करायची आहे.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रोहिणी चालत होती. तेवढ्यात त्यांनी गाडी तिच्यापुढे आडवी घातली. एक जण खाली उतरला अन् त्यानं तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. ‘‘इतका हट्टीपणा कशासाठी करतेस स्वीटी? चल, आमच्याबरोबर…तुला सुपर टाइम देतो. आय प्रॉमिस…’’

‘‘खबरदार हात लावाल तर…मी पोलिसांना बोलवेन. आरडा ओरडा करेन…’’ रोहिणी कडाडली.

तेवढ्यात आणखी एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीत कार्तिक होता.

‘‘रोहिणी, पटकन् ये. गाडीत बैस.’’ त्यानं जोरात हाक मारली. त्या मुलांना झटकून रोहिणी गाडीत बसली. कार्तिकला बघून मुलं पटकन् कारमध्ये बसून निघून गेली.

‘‘इतक्या रात्री हे काय भलतंच सुचलं तुला?’’ कार्तिकनं झापलंच तिला. ही काय बाईनं एकटं दुकटं फिरायची वेळ आहे? कधी गं तुला समजून येणार? कसले गुंड मवाली फिरत असतात. शिकार शोधत असतात…त्यांच्या तावडीत सापडली असती तर?’’

‘‘काय झालं असतं?’’

‘‘ती पोरं तुला गाडीत घालून घेऊन गेली असती…’’

‘‘अशी बरी घेऊन गेली असती? पोलीस असतात ना?’’

‘‘आत्ता इथं जवळपास होता एक तरी पोलीस?’’

रोहिणी गप्प होती.

‘‘तुला त्यांनी गाडीत घालून नेली असती…रेप करून कुठं तरी फेकून मोकळे झाले असते…अगं कळंत नाही तुला? अक्कल शेण खायला गेली का?’’ कार्तिक संतापून म्हणाला.

‘‘असं नसतं झालं. मी मोठ्यांदा ओरडले असते. लोक आले असते…’’

‘‘बोलायच्या गोष्टी आहेत सगळ्या. पाच मिनिटात सगळं घडलं असतं…कुणाला काही समजलंही नसतं…तू एकटी होतीस…ती चौघं तरूण मुलं होती. विचार कर…खरं तर बायकांनी स्वत:च विचार करायला हवा. अनोळखी माणसापाशी लिफ्ट मागणं, निर्जन रस्त्यावर एकटं फिरणं किती धोक्याचं आहे.’’

रोहिणी आता गप्प बसून होती. दोघं घरी पोहोचली…घरात पोहोचताच कार्तिकनं तिला मिठीत घेतली, ‘‘एक वचन दे…कधीही आपलं भांडण झालं तरी तू एकटी अशी घराबाहेर पडणार नाहीस म्हणून.’’ त्यानं खिशामधून इटलीच्या प्रवासाची विमान तिकिटं अन् तिथल्या हॉटेल बुकिंगची कागद पत्रं काढून तिच्या हातात ठेवली.

‘‘हे काय? तुम्ही तर म्हणाला होता की यंदा जमणार नाही म्हणून?’’ रोहिणीनं आश्चर्यानं विचारलं.

‘‘म्हटलं होतं, पण माझ्या लाडक्या बायकोचं म्हणणं मी टाळू शकत नाही ना?’’

‘‘नको, तिकिटं कॅन्सल करा.’’

‘‘का?’’

‘‘अहो, शंकुतला अक्कांकडे लेकीचं लग्न आहे. आपल्याला जावं लागेल ना?’’

‘‘अक्काला सांगेन काही तरी कारण…नाही जमत यायला.’’

‘‘घ्या! म्हणजे पुन्हा सगळ्यांकडून ऐकून घ्यायचं की रोहिणी सासरच्यांशी फटकून वागते अन् नवऱ्यालाही मुठीत ठेवलंय…त्यालाही आमच्यात मिसळू देत नाही.’’

आश्चर्यानं तिच्याकडे बघत कार्तिकनं म्हटलं, ‘‘कमाल करतेस गं! चित पण तुझा, पट पण तुझा? अगं छापा, काटा एक काही तरी ठरव ना? कसं काय करावं मी?’’

‘‘असंच आहे माझं!’’ त्याला मिठी मारत अतीव समाधानानं अन् गर्वानं रोहिणीनं म्हटलं.

एकच प्रश्न

कथा * भावना गोरे

‘‘आकाश, तू आपल्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीस, अरे लग्नाला दहा वर्षं झालीत, पण अजूनही मला चिंटू गोटूपेक्षा तुझ्याकडेच जास्त लक्ष द्यावं लागतंय.’’ घाईघाईनं आकाशचा जेवणाचा डबा भरता भरता कोमल बोलत होती. तेवढ्यात आकाशचा फोन वाजला अन् तो घाईनं जाऊ लागला.

‘‘अरे, निदान डबा तरी घे…’’ हातात डबा घेऊन कोमल त्याच्या मागे धावली.

टिफिन घेताच आकाशची गाडी फुर्रकन निघून गेली.

आज कोमलला जरा निवांतपणा मिळाला. तिनं चहा करून घेतला अन् ती चहा घ्यायला शांतपणे खुर्चीवर बसली. लग्नानंतर कोमलला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं. त्या काळात सकाळचा चहा ती अन् आकाश एकत्रच घ्यायची.

शेजारी राहणाऱ्या शीला मावशींचा नवरा परदेशात होता. दोन्ही मुलंही मोठी होऊन परदेशी निघून गेलेली. पण ती मजेत एकटी राहायची. अभिमानानं म्हणायची, ‘‘जवळ नाहीएत तर काय झालं? पण दोन मुलगे आहेत ना माझे.’’

कोमलला स्वत:ला मूल नाही म्हणून फार वाईट वाटे. पण आकाश तिला धीर द्यायचा. ‘‘होतील गं, तुलाही दोन मुलगे होतील…डॉक्टरांनी सांगितलंय ना, होईल तुला बाळ…तू अजिबात काळजी करू नकोस.’’

त्याच्या प्रेमळ स्पर्शानं, आपुलकीच्या बोलण्यानं कोमलला खूप आधार वाटायचा. तिचं दु:ख कमी व्हायचं.

कोमलची शेजारीण दिव्या रेडिओवर नोकरी करत होती. तिची लहानगी मुलगी मिनी कोमलला खूप आवडायची. एकदा कोमल बाल्कनीत उभी होती. सहज नजर खाली गेली तर मिनी शाळेची बॅग घेऊन तिच्या घरासमोर बसून होती. घर बंद होतं. कोमलला वाईट वाटलं. तिनं मिनीला वर बोलावून घेतलं. तिला खायला प्यायला दिलं. मग दिव्याला फोन केला, तर समजलं की अचानक एक मीटिंग ठरली, त्यामुळे दिव्याला यायला उशीर होतोय. कोमलनं तिला म्हटलं, ‘‘मिनी माझ्या घरी मजेत आहे, काळजी करू नकोस.’’

‘‘दिव्या घरी परतल्यावर तिनं कोमलचे मनापासून आभार मानले.’’

‘‘यापुढे तू काळजी करू नकोस, तुला उशीर झालाच तर मी मिनीची काळजी घेईन.’’ कोमलनं म्हटलं.

दिव्यानं म्हटलं, ‘‘तुझ्या मदतीबद्दल खरंच आभारी आहे. पण आता अशी वेळ येणार नाही. मी एका पाळणाघराची व्यवस्था केली आहे. शाळेतून मिनीला सरळ पाळणा घरात सोडतील अन् मी कामावरून येताना तिला घेऊन येत जाईन.’’

‘‘म्हणजे मिनीचं माझ्याबरोबर राहणं तुला आवडत नाही का?’’ कोमल उदासपणे म्हणाली. तिचे डोळे भरून आले.

तिच्या खांद्यावर हात ठेवून दिव्यानं म्हटलं, ‘‘असं नाहीए गं! तुला हवा तेवढा वेळ तू मिनीबरोबर घालव. पण मला  असं वाटतं की माणसानं नेहमीच आत्मनिर्भर राहावं. स्वावलंबी असावं. मी नोकरी करते त्या मागचं कारणही हेच आहे. माझ्या नवऱ्याचे तीन तीन फार्म हाउसेस आहेत. मी आरामात घरी बसून खाऊ शकते. पण मला ते नाही आवडत. स्वत: कमावण्याचं सुख आणि आनंद वेगळाच असतो.’’

कोमलला तिचं बोलणं पटलं. स्वत: नोकरी करावी असं तिलाही वाटू लागलं अन् लवकरच तिला संधीही मिळाली.

दिव्याच्या ऑफिसमधली एक मुलगी आजारी पडली. दिव्यानं बॉसला विचारून कोमलला त्या जागी नोकरीला लावलं. कोमलचा आवाज रेडिओसाठी फारच योग्य होता. तिनं थोडं प्रशिक्षण घेतलं अन् लवकरच ती रेडियोची लोकप्रिय आर्टिस्ट ठरली. तिला रेडियोवर परमनंट नोकरी दिली गेली. या काळात आकाशनंही तिला प्रोत्साहन दिलं. ती आता अगदी आनंदात होती. त्याचवेळी तिला समजलं की ती आई होणार आहे. डॉक्टरांनी तिला जुळं होणार हेही स्पष्टपणे सांगितलं.

आता नोकरी की कुटुंब हा प्रश्न होता. कोमलनं कुटुंबाला प्राधान्य दिलं. बॉसला अडचण सांगितली अन् नोकरीचा राजिनामा दिला. बॉसनं तिची अडचण समजून घेतली.

नऊ महिने पूर्ण झाले अन् कोमलनं जुळ्या मुलांना जन्म दिला. दोन देखणे राजकुमार कुशीत आले अन् कोमलचं मन आनंदानं, अभिमानानं भरून आलं.

सासर माहेरची मदत नसताना एकट्यानं दोन बाळांना वाढवताना कोमल थकून    जायची. पण आकाश तिला अजिबात मदत करत नसे. कोमल आपल्याच विश्वात दंग होती. तिला आकाशमधला बदल पटकन् जाणवला नाही. तो हल्ली खूपच वेळ ऑफिसात असायचा. बरेचदा तो ऑफिसच्या टूरवर असायचा. कोमलनं स्वत:चीच समजूत घातली की कदाचित बाळाच्या वाढत्या खर्चामुळे तो ऑफिसमध्ये जास्त काम करत असेल. पण तरीही दोन्ही बाळांना त्यानं कधी जवळ घेतलं नाही की कोमलची कधी काळजी घेतली नाही. तो असा कसा वागतो तेही तिला समजत नव्हते. मुलं झाल्यावर नवराबायकोतलं प्रेम अधिकच वाढतं असं ती ऐकून होती. पण इथं तर उलटाच अनुभव येत होता.

आता कोमलला लक्षात आलं होतं की आकाशला तिचा स्पर्शही नको असतो. बघताबघता बाळं पाच वर्षांची झाली. पण आकाश मात्र त्यांच्यापासून दूरदूरच होता. मधल्या काळात कोमलला आकाशबद्दल काहीबाही ऐकायला येत होतं. पण तिचं भाबडं मन त्यावर विश्वास ठेवत नव्हतं.

एक दिवस दिव्यानं तिला म्हटलं, ‘‘तुला एक आमंत्रण आहे. ‘रेडिओ प्रेझेंटशन’चा एक कार्यक्रम होता. नव्या जुन्या सर्व आर्टिस्ट कर्मचाऱ्यांना आमंत्रण होतं. आकाश ऑफिसच्या दौऱ्यावर होता. तिनं मुलांना पाळणाघरात सोडलं आणि ती छान आवरून तयार झाली आणि दिव्याबरोबर हॉटेल सूर्यात पोहोचली. पार्टीला नुकतीच सुरूवात झाली होती, तेवढ्यात तिला आकाश एका मुलीबरोबर दिसला. तो इथं कसा? ऑफिसच्या टूरवर होता ना? ती त्याच्या मागे धावली. तोपर्यंत लिफ्टचा दरवाजा बंद होऊन ती वर निघून गेली होती. तिनं रिसेप्शनिस्टकडे चौकशी केली. तर मिस्टर आणि मिसेस आकाशच्या नावानं रूम नंबर ५०१ बुक केली होती. कोमलला एकदम घेरीच आली.’’

तेवढ्यात तिला शोधत आलेल्या दिव्यानं तिला सावरलं. तोंडावर पाणी मारून सावध केलं. तिला पार्टीत नेलं.

कोमलचे जुने बॉस तिला बघून खुश झाले. म्हणाले, ‘‘कोमल लोक अजूनही तुझी आठवण काढतात. तुला वाटेल तेव्हा तू परत ये नोकरीवर. यू आर मोस्ट वेलकम.’’

कशीबशी पार्टी आटोपून घरी पोहोचली अन् धाय मोकळून रडू लागली. काय दोष होता तिचा म्हणून आकाश असं वागत होता? तो सरळ वेगळा होऊ शकला असता. पण अशी फसवणूक? का म्हणून? तिनं आकाशला फोन केला. तो बंद होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश घरी आला. कोमलनं टूरबद्दल विचारलं तर थोडा भांबावला अन् हॉटेल सूर्यात कुणा स्त्रीबरोबर रूमनंबर पाचशे एकमध्ये गेल्याचं तिच्या तोंडून ऐकल्यावर चिडून तो अद्वातद्वा बोलू लागला. तिलाच दूषणं दिली अन् घराबाहेर निघून गेला.

कोमलला खात्रीच पटली. आता आकाशच्या आयुष्यात तिला स्थान नव्हतं. दोन मुलांच्या पित्याचा मान तिनं त्याला दिला होता. तिला वाटलं तो तिला अभिमानानं मिरवेल त्या उलट त्यानं तिला त्याच्या आयुष्यातून हाकलून लावलं होतं. कोमलनं परोपरीनं प्रयत्न केले, विनवलं, मुलांची शपथ घातली. भांडली, धमकीही दिली पण तो मख्ख होता. त्यानं एकच वाक्य म्हटलं, ‘‘तुला मुलांचा खर्च देतो पण माझ्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस.’’

कोमलला खूपच अपमान वाटला. ती आता माहेरीही जाणार नव्हती. कोर्टातून रीतसर डायव्होर्स घ्यायचा. मुलांना आपलंच नांव लावायचं अन् त्यांना स्वाभिमानानं वाढवायचं. नव्यानं आयुष्य सुरू करायचं.

तिला बॉसचे शब्द आठवले. ‘‘यू आर मोस्ट वेलकम.’’ तिनं फोन केला. नोकरी मिळेल का विचारलं. त्यांनी आनंदाने होकार दिला. ‘‘यू आर मोस्ट वेलकम.’’

शांतपणे बसून कोमलनं खूप विचार करून निर्णय घेतला. इतक्यात घर सोडायचं नाही. नोकरी सुरू करायची. आयुष्याची विखुरलेली, विस्कटलेली पानं गोळा करून पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करायचं. स्वत:ला सिद्ध करायचं. रडत कुढत बसायचं नाही. ताठ मानेने स्वाभिमानानं जगायचं.

एकच वाटत होतं…पुढे मागे आकाशला पश्चात्ताप झाला अन् तो परत आला तर? त्यानं क्षमा मागितली तर ती त्याला क्षमा करू शकेल? तेवढा एकच प्रश्न तिला छळत होता.

नजर भेटीचा खेळ

कथा * पूनव आरडे

नजरभेटीचा खेळ, दोन डोळ्यांनी, दुसऱ्या दोन डोळ्यांशी शब्दांशिवाय साधलेला संवाद हा माझ्या मते जगातला सर्वाधिक सुंदर आणि रोमांचक खेळ आहे (निदान सुरूवातीला तरी असंच वाटतं). या खेळातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चार डोळे हा खेळ खेळतात त्यांच्या पलीकडे कुणालाच त्याबद्दल काही शंका येत नाही. मीदेखील सुमारे एक वर्षांपूर्वी हा खेळ सुरू केला होता. इथं मुंबईत जुलै महिन्यात खूप पाऊस पडतो. आमच्या सोसायटीच्या बागेतल्या जॉगिंग ट्रेकवर पाण्यामुळे थोडं शेवाळं साचतं. तिथं पाय घसरण्याची भीति असते. खरं तर मला घराबाहेर म्हणजे सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर जायला अजिबात आवडत नाही. तिथलं ट्रॅफिक, बसचे हॉर्न, लोकांचा गोंगाट मला नको असतो. म्हणूनच कोलाहलापासून दूर सोसायटीच्या बागेत फिरणं हा माझा नित्यक्रम असतो.

हं, तर पावसाल्यातल्याच एका दिवशी मी घरापासून वीसएक मिनिटांच्या अंतरावर असेलल्या दुसऱ्या मोठ्या पार्कात सकाळच्या ब्रिस्क वॉकसाठी जात होते. तिथंच वाटेत तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. अवचितच आम्ही एकमेकांकडे बघितलं. त्या क्षणार्धाच्या नजरभेटीत जे घडायचं, ते घडून चुकलं होतं. मला वाटतं, हा डोळ्यांचाच दोष असावा. कुणाचे डोळे कुणाच्या डोळ्याला भिडले तर मग त्यावर काही उपाय नाहीए अन् मला वाटतं हाच चार डोळ्यांच्या नजरभेटीचा खेळ आहे.

हं! तर, जेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं तेव्हा काहीतरी घडलं. काय घडलं हे सांगणं, त्या क्षणाचं वर्णन करणं, त्या भावनांना शब्दरूप देणं अवघड आहे. पण इतकंच  आठवतं की तो सगळा दिवस फारच मस्त गेला. घरी परतताना वाहनांचे कर्कश्श हॉर्नदेखील जाणवले नाहीत. रस्त्यावरच्या कोलाहलानं वैताग आणला नाही. सकाळी सात वाजता मी हवेत उडंत अगदी आनंदानं गाणं गुणगुणत घरी आले.

२२ वर्षांची माझी मुलगी कोमल आठ वाजता कॉलेजला जाते. नवरा नऊ वाजता ऑफिसला जातो. मी रोजच्याप्रमाणे कोमलला हाक मारून किचनमध्ये शिरले. भराभर सकाळची कामं आवरली. दोघं निघून गेल्यावर सगळा दिवस मला खूप उत्साह वाटत होता. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा वॉकसाठी बाहेर पडले. पुन्हा त्याच जागी तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. आमची नजरानजर झाली. मनात, देहात एक गोड शिरशिरी जाणवून गेली. नकळत उत्साह संचारला…शरीर जणू पिसासारखं हलकं झालं होतं. नंतर पुढल्या तीनचार दिवसात मला अगदी स्पष्टपणे लक्षात आलं की तो माझा वाट बघतो. पुन्हा:पुन्हा वळून तो त्या वळणाकडे बघत असतो जिथून मी त्या रस्त्यावर येणार असते. मी अगदी दुरूनच त्याला पुन्हा:पुन्हा बघताना पकडलं होतं.

नजरभेटीचा हा खेळ खूपच छान सुरू झाला होता. दोघंही खेळाडू उत्सुकतेनं सकाळची वाट बघत असायचे. संडेला मी कधीच सकाळचा वॉक घेत नव्हते. त्या दिवशी माझा ब्रेक असायचा…आज मी संडेला बाहेर पडले तसं दचकून निखिलनं विचारलं, ‘‘अगं, कुठं निघालीस?’’

‘‘फिरायला…’’ मी उत्तरले.

‘‘पण आज तर रविवार आहे?’’

‘‘आता झोप उघडलीच आहे, तर जाऊन येते. तुम्ही अजून पडून रहा…मी आलेच!’’ म्हणत मी सरळ बाहेरचा रस्ता गाठला. बघितलं तर तो तिथं होताच. आज त्याचा मुलगा बरोबर नव्हता. बहुधा झोपला असावा रविवार म्हणून. पण आज तो त्याच्या पत्नीसोबत होता. मुद्दाम लक्षपूर्वक मी त्याच्या पत्नीकडे बघितलं. छान होती ती. सुंदर आणि स्मार्ट. मला आवडली. त्यानं मला बघितलं अन् बायकोची नजर चुकवून तो माझ्याकडे बघून चक्क हसला. प्रथमच हसला अन् माझ्या सकाळी उठून येण्याचं जणू सार्थक झालं.

म्हणजे आमच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी होतं. त्यामुळे माझ्यात खूपच बदल झाला होता. सकाळची वाट बघण्यात माझी सगळी दुपार, सायंकाळ अन् रात्रही संपत होती. दहा दिवसातच मी किती बदलले होते. संपूर्ण दिवस ही एक जाणीव की या वयातही कुणीतरी आपली वाट बघतंय, रोमांचित करायला पुरेशी होती.

हळूहळू एक महिना पूर्ण झाला. या खेळातल्या दोन्ही खेळांडूनी तोंडानं एक शब्दही उच्चारला नव्हता. डोळेच विचारायचे, डोळेच उत्तर द्यायचे.

एक दिवस नवऱ्यानं विचारलंच, ‘‘आजकाल तू सोसायटीच्या बागेत फिरत नाहीस का?’’

‘‘नाही, तिथं बुळबुळीत झालंय, मला घसरायची भीती वाटते.’’

‘‘पण तुला तर बाहेरचा कोलाहल आवडत नाही ना?’’

‘‘पण पाय घसरून पडण्यापेक्षा तो परवडला ना?’’ उत्तर दिलं मी, पण मनातून जरा अपराधीही वाटत होतं. तरीही या खेळात खूपच मजा वाटत होती म्हणून पुन्हा सकाळची वाट बघायला लागले.

आता खरं तर पावसाळा संपला होता, पण अजूनही बाहेरच्याच बागेत जात होते. ऑक्टोबर सुरू झाला होता. चार डोळ्यांच्या भेटीचा खेळ खूपच रोमांचक झाला होता. मला बाहेरचा कोलाहल आणि गर्दी आवडत नसतानाही केवळ त्याला बघण्यासाठी घाईनं बाहेर पडत होते. पूर्वीपेक्षा अधिक व्यवस्थित कपडे घालून, छान क्रीम पावडर लावून, नवीन टीशर्ट्स, नवीन ट्रॅकपॅन्ट्स, स्टायलिश बूट घालून, सेंटचा फवारा मारून, शोल्डरवर केसांची कधी उंच पोनी बांधून तर कधी केस मोकळे सोडून. त्यावेळी मला मी अगदी सोळा वर्षांची तरूणी असल्यासारखं वाटायचं. कसली धावायची मी…खरं तर सकाळचं फिरणं वर्षांनुवर्षं चाललंय. पण इतकी मजा यांपूर्वी कधीच आली नव्हती.

त्याच्या नजरेशी नजर भेटली की किती प्रश्न असायचे. डोळेच प्रश्न विचारत, डोळेच उत्तर देत. कधी सुट्टीच्या दिवशी उशीर झाला किंवा इतर दिवशी काही कारणानं खाडा झाला तर त्याचे डोळे तक्रार करायचे. त्याचं उत्तर मी डोळ्यांनीच, फक्त हसून द्यायची. कधी कधी तो बहुधा मुद्दामच बघत नसे. मग मीच त्याच्याकडे टक लावून बघायचे. मग तोही मनमोकळे हसायचा. खरंच किती मजेदार खेळ होता…थोडा विचित्रही होता…बोलायची गरजच नव्हती. सकाळी एकदा बघितलं की संपूर्ण दिवस मी एका अनामिक आकर्षणात गुरफटलेली असायचे. मला मग कुणाचा, कशाचा रागही येत नसे की विनाकारण चिडचिडही होत नसे. अगदी प्रसन्न मुद्रेनं, शांतपणे मी माझी घरातली कामं आटोपत असे.

निखिलना आश्चर्य वाटत होतं. एक दिवस त्यांनी म्हटलंच, ‘‘आता तर पावसाळाही संपलाय. जॉगिंग ट्रॅकवरचं वाळलेलं शेवाळंही खरबडून टाकलंय, तरीही बाहेरच्या मार्डनमध्ये जाते आहेस?’’

‘‘हो, जास्त मोठा अन् चांगला राऊंड होतो. इतकी वर्षं इथल्या बागेत फिरून फिरून कंटाळाही आलाय, हा बदल आवडलाय मला.’’

‘‘ठिक आहे. तुला आवडतंय तर काहीच हरकत नाही. फिरणं होतंय हेच महत्त्वाचं!’’ निखिलही फिरायला जायचे पण मी आल्यानंतर ते निघायचे.

त्यानंतर माझं कंबरेचं दुखणं उपटलं. मला खूप त्रास होऊ लागला. सकाळी वीस मिनिटं जायला, वीस मिनिटं यायला लागायची. आल्याआल्या दोघांचे लंच बॉक्स तयार करणं, ब्रेकफास्ट तयार करणं यातच मी दमायचे. पूर्वी मी अर्ध्या तासात घरी आलेली असायचे. दहा मिनिटं मला विश्रांतीसाठी मिळायची. डॉक्टरांकडे जाऊन आले. ते म्हणाले, ‘‘फिरण्याचा वेळ थोडा कमी करून बघा.’’ मी एकदम दचकले. बेचैन झाले. माझी दिनचर्या. दिवस रात्रीचा सर्व वेळ सध्या सकाळी त्याच्या भेटीशी जुळलेला होता. त्याला भेटायचं म्हणजे वीस मिनिटं चालत जायचं अन् वीस मिनिटं चालत परत यायचं. माझ्या दुखण्याने मी त्रस्त होते. थकवा यायचा. आता नियमित जाणं होईना. खाडे व्हायला लागले. कारण आल्यावर किचनमधल्या कामासाठीही एक संपूर्ण तास द्यावाच लागायचा. म्हणजे चाळीस मिनिटं व एक तास जर सलग सकाळी काम केलं तर सगळा दिवस माझी कंबर दुखत राही. अरे बापरे! आता काय करू? इतके दिवस एखाद्या षोडशीच्या उत्साहानं अन् आतुरतेनं रोमांचित होणारी मी…आता काय होणार? सगळं संपणार का?

निखिलला आश्चर्यही वाटत होतं. ते थोडे वैतागलेही होते. मला समजावत होते, ‘‘अगं, इतकी वर्षं इथंच वॉक घेत होतीस ना तर आता सकाळचं फिरणं बंद करून संध्याकाळी फिरायला जा. सकाळी कामं जास्त असतात. ती तर टाळता येणार नाहीत. म्हणून आपणच तोडगा काढायचा. सायंकाळी काम कमी असतात. त्यामुळे तुझ्यावर ताण येणार नाही. तब्येतीला थोडा आराम पडेल…’’

डॉक्टरांनीही हेच सांगितलं. पण मला ते पटेना. फारच विचित्र मन:स्थितीत होते मी. शरीराला विश्रांतीची गरज होती. पण मनाला आनंद तो दिसल्यामुळेच मिळायचा. त्याला बघण्यासाठीच मी बाहेरच्या रस्त्यावर, लांबच्या बागेत जात होते. पण आता खाडे फारच होऊ लागले.

त्याचा मुलगा एव्हाना छानपैकी सायकल चालवू लागला असावा. कारण आता तो एकटाच दिसायचा. नजरभेटीचा खेळ चालूच होता. माझ्या तब्येतीची काळजी न करता मी बाहेर जातच होते.

एक जानेवारीच्या सकाळी पहिल्यांदा त्यानं माझ्या जवळून जाताना, ‘हॅप्पी न्यू ईयर’ म्हटलं. मी ही आपली स्पीड करून, ‘‘थँक्स टू यू,’’ म्हटलं. इतक्या दिवसांच्या या आमच्या नजरभेटीच्या खेळात प्रथमच शब्दांचा वापर झाला. मन मयूर आनंदानं थुईथुई नाचायला लागलं.

आता माझी कंबर जास्त दुखत असली तरी मी कोमल आणि निखिलपासून स्वत:चं दुखणं लपवत होते. ती दोघं घराबाहेर पडली की दुखणारी कंबर शेकत सगळा दिवस लोळून काढायचे. कंबरेला बेल्ट बांधून असायचे. पण कितीही लपवलं तरी वेदना चेहऱ्यावर उमटायची. लेकीच्या लक्षात यायाचं. मग ती कधी प्रेमानं, कधी दटावून म्हणायची, ‘‘मॉम, नको त्रास करू घेऊस. डॉक्टरांनी नको म्हटलंय ना? संध्याकाळीच वॉक घेत जा, सकाळचं फिरणं बंद कर.’’

पण मी ऐकत नव्हते. कारण मी जगातल्या सगळ्यात आकर्षक आणि रोमांचक खेळातील खेळाडू होते.

मे महिना सुरू झाला अन् माझ्या जिवाची घालमेल वाढली. मे महिन्यात मी नेहमीच सायंकाळी फिरायला जायची. उन्हाळा, उकाडा मला अजिबात सहन होत नाही. आठ-दहा दिवस कशीबशी मी गेले. मुंबईतल्या चिपचिप्या उन्हाळ्यात सकाळीच इतकी घामाघूम होऊन जायची. पार थकलेली. आल्या आल्या लिंबूपाणी ढसकल्यावर खरं तर जागचं उठू नये असं वाटायचं…पण सकाळची कामं वाट बघत असायची. उठावंच लागायचं.

या उन्हाळ्यानं तर माझ्या मनाचा अगदी अंतच पाहिला. यावेळचा उन्हाळा तर या चार डोळ्यांच्या खेळातला महत्त्वाचा टप्पा होऊन आला. कितीही प्रयत्न केला तरी मी उन्हाळ्यात रोज नियमित फिरायला जाऊ शकले नाही. सुट्टीच्या दिवशी आवर्जून जायचे. कारण घरी परतल्यावर स्वयंपाक घरात शिरण्याची घाई नसे. त्याला बघण्याचा मोह अनावर होता. पण उन्हाळा अन् काहिली त्यावर मात करत होती. घाम पुसता पुसता जीव नकोसा व्हायचा. त्याला बघून आल्यावर ठरवायचे की आता नाही जाणार…उकाडा सहन होत नाही. मी कुणी सोळा वर्षांची तरूणी आहे का जी प्रियकरासाठी वेडीपिशी होते. नवरा आहे, मोठ्या वयाची मुलगी आहे, अरे मी एक संसारी, मॅच्युअर स्त्री आहे. मी कशाला त्याला भेटायला धावत जावं? अन् इतक्या महिन्यांत नेमकं मिळवलं काय? मला काही त्याच्याशी अफेअर करायचं नाहीए की पुढे संबंध वाढवायचे नाहीएत. जे झालं, ते पुरे झालं. ही बाब इतकी महत्त्वाची नाहीए. उन्हाळा वाढत होता. माझी अक्कल ठिकाण्यावर येत होती. सगळा उत्साह, रोमांस, रोमांच…सगळंच संपल्यात जमा होतं. उन्हाळा, कंबरेचं दुखणं आणि घरकाम या त्रयीनं मला या खेळात पराभूत केलं होतं. मनातून अजूनही त्या पार्कात जावंसं वाटायचं पण प्रत्यक्षात ते जमणं शक्य नाही हे ही समजत होतं.

खरं तर मनात, हृदयात खळकन् काही तरी फुटलं होतं. पण मग स्वत:चीच समजूत घातली की ठीक आहे. जीवन आहे…असंच चालायचं…होतं असं कधीकधी. हे वय, ही वेळ, या जबाबदाऱ्या खरं तर या खेळामध्ये नसाव्यात…पण माझ्यावर त्या आहेत. नजरभेटीच्या या खेळात मी आपला पराभव मान्य केला होता. ‘ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गंमतीची’ ही ओळ आता आयुष्यातून मी पुसून टाकली होती अन् पूर्वीप्रमाणेच आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये सायंकाळी फिरायला जायला लागले होते.

मावा गुटखा हद्दपार

कथा * पूनम अत्रे

संध्याकाळी सहा वाजता ऑफिसमध्ये लोक एक एक करून निघायला लागले, तशी सियानंही आपलं सामान आवरता आवरता एक चोरटी नजर अनिलकडे टाकली. ऑफिसमध्ये नवाच आलेला सर्वात देखणा, उमदा, हसरा, मनममिळाऊ अनिल तिला बघताच आवडला होता. चुंबकासारखी ती त्याच्याकडे ओढली गेली होती.

त्याचवेळी अनिलनंही तिच्याकडे बघितलं अन् दोघंही हसले. एकाच वेळी आपापल्या खुर्च्यांमधून दोघं उठले. लिफ्टपर्यंत सोबतच आले. अजून तीनचार लोक लिफ्टमध्ये होते. सियाच्या लक्षात आलं की अनिलही तिच्याकडे चोरट्या नजरेनं बघत असतो.

गेटमधून बाहेर पडल्यावर अनिलनं विचारलं, ‘‘सिया, तुम्ही कुठं जाणार आहात? मी स्कूटरवरून सोडू तुम्हाला?’’

‘‘नको, थँक्स! मी रिक्षानं जाते.’’

‘‘या ना? एकत्रच जाऊयात…’’

‘‘बरं…’’

अनिलनं बाईक स्टार्ट केली. सिया मागे बसली. अनिलच्या कपड्यांना येणारा सेंटचा मंद सुवास सियाला आवडला. बनारसच्या या ऑफिसात दोघंही नवीनच होते. सियाची नियुक्ती त्याच्या आधी झाली होती.

अनिलनं एकाएकी गाडी रस्त्याच्या कडेला घेत थांबवली. तसं दचकून सियानं विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘काही नाही,’’ म्हणत अनिलनं खिशातून गुटख्यांची पुडी काढली अन् अगदी स्टायलिशपणे गुटखा तोंडात टाकला. मग हसून सियाकडे बघितलं.

‘‘हे काय?’’ सियानं दचकून विचारलं.

‘‘माझा फेवरेट पानमसाला…मावा?’’

‘‘तुम्हाला याची सवय आहे?’’

‘‘हो. अन् ही माझी स्टायलिश सवय आहे…’’

सियाच्या कपाळावर आठ्या अन् चेहऱ्यावर तिरस्कार बघून त्यानं विचारलं, ‘‘का? काय झालं?’’

‘‘या सगळ्या तुमच्या आवडी आहेत?’’

‘‘हो…पण काय झालं?’’

‘‘नाही, काही नाही…’’ सिया पुढे काहीच बोलली नाही, तशी अनिलनं बाइक स्टार्ट केली.

हळूहळू हे रोजचं रूटीन झालं. ऑफिसला येताना सिया रिक्षानं यायची. परतताना अनिलच्या स्कूटरवरून जायची. तिच्या घराच्या थोड्या अलिकडेच तो तिला सोडायचा. हळूहळू दोघांची मैत्री वाढत होती.

अनिलला मॉडर्न, स्मार्ट, सुंदर सिया फारच आवडली होती. आपली आयुष्याची जोडीदार म्हणूनच तो तिच्याकडे बघत होता. हीच स्थिती सियाचाही होती. दोघांनाही खात्री होती की त्यांची निवड त्यांच्या घरातल्यांनाही आवडेल.

अनिलनं तर सियाची निवड फायनल केलीच होती पण सिया मात्र एका मुद्दयावर थोडी अडखळत होती. अनिलची सतत गुटखा, मावा किंवा पानमसाला तोंडात भरायची सवय तिला फारच खटकायची. तिनं अनिलला अनेकदा याबद्दल समजावलंही, त्यातले धोके, आरोग्याची हानी वगैरे विषय तो थट्टेवारीने न्यायचा.

‘‘काय तू म्हाताऱ्या आजीबाईसारखा उपदेश करतेस, अगं आमच्याकडे सगळेच खातात, तूही बघ खाऊन, आवडेलही तुलाही…माझी आई आधी वडिलांवर ते गुटखा खातात म्हणून चिडायची. रागारागानं स्वत:ही खायला लागली अन् आता तिला आवडायलाही लागलाय. आता सगळेच खातात म्हटल्यावर कोण कुणाला हटकणार? छान चाललंय आमचं.’’ हे वर सांगायचा.

सियाला संताप यायचा. रागावर नियंत्रण ठेवून ती म्हणायची, ‘‘पण अनिल, तू इतका शिकलेला, समजूतदार आहेत. तू ही सवय सोडायला हवीस, तुझ्या आईबाबांनाही समजावायला हवं.’’

‘‘सोड गं! काय पुन्हा पुन्हा तू त्याच विषयावर येतेस? आपल्या भेटीतला निम्मा वेळ तर याच विषयात संपतो. तू ते सुंदर गाणं नाही ऐकलंस का? ‘पान खाए सैंया हमारों…’ वहिदा रहमाननं काय सुंदर अभिनय केलाय त्या नृत्यात? तू ही तशीच अभिमानानं सांग ना, गुटखा खाए सैंया हमारों…’’

‘‘ते सगळं सिनेमात असतं. तिथंच शोभतं.’’

अनिल बराच चेष्टा मस्करी करून तिला हसवायचा, पण त्याची ही सवय कशी सोडवायची हे सियाला समजत नव्हतं.

एक दिवस सियानं आपले आईबाबा आणि थोरला भाऊ यांना भेटायला अनिलला आपल्या घरी बोलावलं. अनिलचं एकूणच व्यक्तिमत्त्व असं होतं की तो बघताक्षणीच सर्वांना आवडायचा. छान गप्पा रंगल्या, चहाफराळ, हास्य विनोद चालू असताना मध्येच अनिलनं, ‘‘एक्सक्यूज मी,’’ म्हणत खिशातून पानमसाल्याची पुडी काढून तोंडात गुटखा कोंबला, तेव्हा सर्वच चकित होऊन गप्प बसून राहिले.

अनिल निघून गेल्यावर तिला जे वाटलं होतं, तसंच घडलं. सियाची आई म्हणाली, ‘‘मुलगा तसा खूप चांगला आहे, पण त्याला ही सवय जर असेल तर…’’ भाऊ, बाबा सगळ्यांचंच मत तेच होतं. सियानंही म्हटलं, ‘‘खरंय, मलासुद्धा त्याची ही सवय अजिबात आवडत नाही, पण ती सोडवू कशी ते ही कळत नाहीए.’’

त्यानंतर थोड्याच दिवसांनी अनिलनं सियाला आपल्या घरी नेलं. अनिलचे आईबाबा, धाकटी बहिण, सगळ्यांनी तिचं प्रेमानं स्वागत केलं. सगळ्यांनाच सिया अन् सियालाही सगळी माणसं खूप आवडली. अनिलच्या आईनं तर तिला जेवणासाठी थांबवूनच घेतलं. गप्पा मारता मारता मदतही करावी म्हणून सिया स्वयंपाकघरात आली. सियाला दिसलं की फ्रीजमधलं एक शेल्फ विड्यांनी (पानाचे विडे) भरलेलं होतं.

‘‘हे…इतके विडे?’’ आश्चर्यानं तिनं विचारलं.

‘‘अगं हो,’’ हसून अनिलच्या आईनं म्हटलं, ‘‘आम्हा सर्वांना सवय आहे. बनारसचे विडे (खायके पान बनारसवाला) तर प्रसिद्धच आहे ना.’’

‘‘पण…आरोग्याच्या दृष्टीनं…’’

‘‘सोड गं! पुढलं पुढे बघूयात…’’ त्यांनी हसून विषय टाळला.

किचनमध्ये एका बाजूला दारूच्या बाटल्यांचाही ढीग दिसला. सिया बाथरूममध्ये गेली अन् तिला एकदम मळमळायलाच लागलं. बाहेरून इतकं सुंदर, श्रीमंत घर पण बाथरूम केवढा गलिच्छ शी:! सगळीकडे पान मसाला, गुटख्याची रिकामी पाकिटं अन् जिथं तिथं थुंकलेलं…शी गं बाई! सभ्य, सुसंस्कृत घराचं हे रूप तर किळस आणणारं होतं. जर या घरात ती सून म्हणून आली तर तिचं आयुष्य हे पानाचे डाग अन् गुटख्याची पाकिटं उचलण्यातच जाणार का? कसंबसं तिनं जेवण आटोपलं. अनिलनं तिला घरी सोडलं.

सियाच्या मनात विचारांचा कल्लोळ होता. अनिल आयुष्याचा जोडीदार म्हणून चांगला होता. घरातली माणसंही प्रेमळ, समंजस होती, पण दारू, पानमसाला पान खाऊन थुंकणं या सगळ्या गोष्टी तिला न मानवणाऱ्या होत्या. तिच्या स्वच्छतेच्या अन् आरोग्याच्या, पर्यावरणाच्या कल्पनेत ते बसतच नव्हतं. घरी आल्यावर ती कुणाशीच काही बोलली नाही. पण तिचा विचार मात्र पक्का ठरला होता. दोन तीन दिवस ती अनिलपासून दूरच राहिली. सियाच्या या वागण्यामुळे अनिल चकितच झाला. ती असं का करतेय हे त्याच्या लक्षात येईना. शेवटी सिया घरी जायला निघाली, तेव्हा त्यानं तिचा हात धरला अन् तो तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेला. तिथं बसल्यावर त्यानं विचारलं, ‘‘काय झालंय? काही सांगशील की नाही?’’

सिया याच क्षणाची वाट बघत होती. शांत, संयमित आवाजात ती म्हणाली, ‘‘अनिल, मला तू खूप आवडतोस. पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार…’’

‘‘का?’’ अनिल आश्चर्यानं ओरडलाच.

‘‘तुला अन् तुझ्या कुटुंबातल्या माणसांना ज्या काही सवयी आहेत, त्या मला सहन करता येणार नाहीत. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, तुम्हाला कळत नाही का? अरे कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो…परिसर, पर्यावरण घाण होतं हे तुम्हाला जाणवत नाही का? कधी तरी सणावाराला, गोडाधोडाचं जेवण झाल्यावर एखादा विडा खाणं अन् सतत गुटख्याचे, पानाचे तोबरे करणं यात फरक आहे ना? अश्या घाणेरड्या सवयी असलेल्या कुटुंबात सून म्हणून मी राहू शकत नाही. सॉरी अनिल. मला ते जमणार नाही.’’

अनिलचा चेहरा पडला होता. कसाबसा तो एवढंच बोलू शकला, ‘‘सिया, मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.’’

‘‘होय अनिल, मलाही तुझ्यापासून दूर जायचं नाहीए. पण ही व्यसनं मला सहनच होत नाहीत. माझ्या तत्त्वात ते बसत नाही. आय एम सॉरी…’’ ती खुर्चीवरून उठली.

अनिलनं तिचा हात धरला. ‘‘सिया, मी जर हे सगळं सोडायचा प्रयत्न केला तर? आईबाबांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर?’’

‘‘तर या प्रयत्नात मी तुझ्या बरोबरीनं मदत करेन.’’ सियानं हसून खात्री दिली.

‘‘पण यात श्रम अन् वेळ दोन्ही लागणार आहे. निग्रहाची कसोटी असेल, हे लक्षात ठेव.’’

बाय करून सिया निघून गेली. आत्मविश्वासानं पावलं टाकत जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अनिल विचार करत होता.

सवयीनं हात खिशाकडे गेला. अन् दुसऱ्याच क्षणी विजेचा झटका बसावा तसा बाहेर आला. तो पार बावचळला होता. दोन्ही हातांनी डोकं धरून बिचारा बसून राहिला.

फिरूनी पुन्हा उमलेन मी

कथा * रेणू श्रावस्ती

‘‘काय झालं, लक्ष्मी? आज इतका उशीर केलास यायला?’’  स्वत:ची चिडचिड लपवत सुधाने विचारलं.

‘‘काय सांगू मॅडम तुम्हाला? ते मनोजसाहेब आहेत ना, त्यांच्या रिचाला काही तरी झालंय म्हणे. कुठे शाळेच्या पिकनिकला गेली होती. तुम्ही आपल्या घरात बसून असता, तुम्हाला कॉलनीतल्या बातम्या कशा कळणार?’’ लक्ष्मीने म्हटलं.

लक्ष्मीला दटावत, तिच्या बोलण्याला आळा घालत सुधा म्हणाली, ‘‘मला ठाऊक आहे. रात्रीच मी जाऊन आलेय तिथे. फार काही घडलं नाहीए. तू उगीच सगळीकडे मनाने काही सांगत बसू नकोस.’’

हुशार, शांत, समजूतदार रिचाला काय झालं असेल याचा तिला नीट अंदाज करता आला नाही तरी एक पुसटशी अभद्र शंका मनाला चाटून गेलीच. शाळेची पिकनिक गेली होती म्हणे…

कॉलेजातून रिटायर झाल्यावर सुधा सोसायटीतल्या मुलांच्या सायन्स अन् मॅथ्सच्या ट्यूशन घ्यायची. पैशाची गरज नव्हती. त्यामुळे अनेक गरीब मुलं तशीच शिकायला यायची. हिंदी अन् कॉम्प्युटर हे विषयही ती सहज शिकवू शकत होती. मुलांनी करिअर कसं निवडावं, त्यासाठी कुठला अभ्यास करावा, कसा करावा या गोष्टी ती इतकी तळमळीने सांगायची की मुलांचे आईवडीलही तिचा सल्ला सर्वोपरी मानायचे. रिचा तिची लाडकी विद्यार्थिनी. कॉम्प्युटरमध्ये तिला विशेष गती होती.

लक्ष्मी काम करून गेल्या गेल्या सुधाने तिची मैत्रीण अनामिकाचं घर गाठलं. अनामिका रिचाची मावशी होती. तिने जे सांगितलं ते ऐकून सुधा शहारली, काल शाळेची ट्रिप गंगेच्या पल्याडच्या काठावर गेली होती. बोटिंग वगैरे झाल्यावर सर्वांचं एकत्र डबे खाणं झालं. जिलेबी अन् समोसे शाळेकडून मुलांना दिले गेले. सगळी मुलं आनंदाने सुखावलेली. वेगवेगळे गट करून कुणी भेंड्या, कुणी नाचगाणी, कुणी झाडाखाली लोळणं असं सुरू होतं. काही मुलं जवळपास फिरून पानंफुलं एकत्र करत होती. त्याच वेळी रिचा फिरत फिरत ग्रुपपासून जरा लांब अंतरावर गेली. निघायच्या वेळी सगळी मुलं एकत्र आली तेव्हा रिचा दिसेना म्हणताना शोधाशोध सुरू झाली. थोड्या अंतरावर झोपडीत बेशुद्ध पडलेली रिचा दिसली. टीचर्सपैकी दोघी तिला घेऊन बोटीने पटकन् अलीकडच्या काठावर आल्या. इतर मुलं बाकीच्या स्टाफबरोबर गेली. रिचाला टॅक्सीने इस्पितळात नेलं. तिच्या घरीही कळवलं. घरून आईवडील इस्पितळात पोहोचले.

सुधा स्तब्ध होती. रिचाला भेटायला जावं की न जावं ते तिला समजत नव्हतं. काही क्षणात तिने निर्णय घेतला अन् गाडी काढून सरळ ती रिचाला अॅडमिट केलं होतं त्या इस्पितळात पोहोचली. समोरच रिचाचे वडील भेटले. रात्रभरात त्यांचं वय दहा वर्षांनी वाढल्यासराखं दिसत होतं. सुधाला बघताच त्यांना रडू आलं. स्वत:ला सावरत सुधाने त्यांना थोपटून शांत केलं. तेवढ्यात रिचाच्या आईने तिला मिठी मारली अन् आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली. तिचे हुंदके अन् अश्रू थांबत नव्हते.

रिचाला झोपेचं इजेक्शन दिल्यामुळे ती झोपली होती. पण काल रात्री जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा मात्र खूपच रडत होती. घडलेल्या घटनेचा मनावर खोलवर परिणाम झाला होता. मला जगायचं नाहीए वगैरे बोलत होती.

अरूणाला तिने रडून घेऊन दिलं. ती थोडी शांत झाल्यावर तिने तिथल्या प्रमुख लेडी डॉक्टरचं नाव विचारलं अन् तिला जाऊन भेटली. ‘‘हे प्रकरण कृपा करून मीडियापर्यंत जाऊ देऊ नका; कारण त्यात पोरीची बेअब्रू होते. गुन्हेगारांना शासन होत नाही.’’ डॉक्टरही तिच्या मताशी सहमत होत्या.

‘‘आमच्याकडे येण्याआधीच शाळेने पोलिसात रिपोर्ट केला होता.’’ डॉक्टर म्हणाल्या. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याचं नावही सांगितलं. ते सुधाच्या कॉलेजात एकदा चीफगेस्ट म्हणून आलेले होते. सुधा सरळ त्यांना जाऊन भेटली. त्यांनी आदरपूर्वक तिचं स्वागत केलं.

‘‘सर, आपल्या समाजात बलात्कारित मुलीला किंवा स्त्रीला कोणत्या दिव्यातून जावं लागतं याची तुम्हाला कल्पना आहे. आता इतक्या मोठ्या शहरात कोण असेल तो नरपिशाच्च ते कसं अन् किती काळात शोधाल तुम्ही? समजा तो नराधम शोधून काढला तरी त्यामुळे त्या निरागस पोरीच्या शरीरावर, मनावर झालेल्या जखमा भरून येतील का? कोर्टात केस गेली तर कुठल्या कुठल्या प्रश्नांना ती पोर तोंड देईल? मनाने आत्ताच खचली आहे ती. तिला पुन्हा उभी करायचीय आपल्याला. तुम्ही कृपया ही केस काढून टाका. मी शाळेच्या ऑफिसरशी बोलते. एवढी कृपा करा.’’

सुधाला एक हुशार प्रोफेसर व नावाजलेली अन् लोकप्रिय शिक्षिका म्हणून पोलीस अधिकारी ओळखत होते. त्यांनाही तिचं म्हणणं पटलं. ते स्वत: व सुधाही शाळेतल्या अधिकारी मंडळींशी बोलले. केस मागे घेतली गेली.

सुधा परत नर्सिंगहोममध्ये आली. प्रथम तिने रिचाच्या आईवडिलांचं बौद्धिक घेतलं. काय घडलं, आता काय करायचं आहे. पालक म्हणून त्यांनी कसं वागायचं आहे. घराबाहेरच्या लोकांच्या प्रश्नांना, विशेषत: तिरकस प्रश्नांना कसं सामोरं जायचं, कशी उत्तर द्यायची. आपला तोल कसा राखायचा अन् रिचाशी कसं वागायचं हे तिने व्यवस्थित समजावलं. दोन तासाच्या त्या सेशनमध्ये त्यांना दोनदा खायलाप्यायलाही घातलं. त्यामुळे ती दोघं बऱ्यापैकी सावरली. सुधाने त्यांना ‘‘दोनतीन तास घरी जाऊन विश्रांती घ्या. अंघोळी व रात्रीचं जेवण उरकूनच पुन्हा इथे या, तोपर्यंत मी इथेच आहे. रिचाला व्यवस्थित सांभाळते,’’ असंही म्हटलं. भारावलेल्या मनाने अन् पावलांनी ती दोघं घरी आली.

सुधा रिचाच्या बेडजवळ बसून होती. रिचाला जाग येत होती. ती झोप अन् जाग याच्या सीमारेषेवर होती. थोडी हालचाल सुरू झाली होती अन् एकदम जोरात किंचाळून तिने डोळे उघडले. त्या अर्धवट गुंगीत तिला स्वप्नं पडलं असावं. समोर सुधा दिसताच तिने सुधाला मिठी मारली अन् ती रडायला लागली.

तिला जवळ घेत प्रेमाने थोपटत सुधा म्हणाली, ‘‘शांत हो बाळा…शांत हो, अजिबात घाबरू नकोस…’’

‘‘मावशी…’’ रिचाने हंबरडा फोडला.

‘‘हे बघ रिचा, तू आधी शांत हो. तू आता अगदी सुरक्षित आहेस. तुला कुणी हातही लावू शकत नाही. समजतंय ना? जे घडलं ते घडलं. ते विसरायचं. तो एक अपघात होता. हातपाय न मोडता, डोकं न फुटता आपण सहीसलमात आहोत ही गोष्ट फक्त ध्यानात ठेव.’’? शांतपणे तिला थोपटत एकेका शब्दावर जोर देत खंबीर आवाजात सुधा रिचाची समजूत घालत होती.

हळूहळू रिचा शांत होत गेली. ‘मी घाण झालेय. मला मरायचंय’ ही वाक्य ती अजूनही मध्येच बोलायची. पण सुधा न कंटाळता न थकता तिला समजावत होती. ‘‘मी शाळेत जाणार नाही. इतर मुली मला काय म्हणतील?’’ या तिच्या प्रश्नावर सुधाने म्हटलं, ‘‘काय म्हणतील? त्यांना काही म्हणायची संधी आपण द्यायचीच नाही. जितकी घाबरशील, तितके लोक तुला घाबरवतील. धीटपणे, डोळ्याला डोळा देऊन उभी राहिलीस तर ते तुला घाबरतील.’’

‘‘पण माझं चुकलंच…’’ मी एकटीने फिरायला जायला नको होतं.

‘‘पण समजा, एकटी गेलीस तर त्याचं आता वाईट नको वाटून घेऊस…असे अपघात घडतातच गं!’’

तेवढ्यात चेकअपसाठी लेडी डॉक्टर आली. ‘‘मला मरायचंय डॉक्टर…’’ रिचा पुन्हा रडायला लागली.

‘‘अगं, एवढी शूर मुलगी तू…किती निर्धाराने झगडली आहेस…तुझ्या शरीरावरच्या जखमा सांगताहेत तुझं शौर्य…तुला लाज वाटावी असं काहीच घडलेलं नाहीए.’’ डॉक्टरने तिला म्हटलं. त्यांनी सुधाला म्हटलं, ‘‘तिला अजून विश्रांतीची गरज आहे. तिला थोडं खायला घाला मग पुन्हा एक झोपेचं इंजेक्शन द्यावं लागेल…हळूहळू सगळं ठीक होईल. गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊ.’’

डॉक्टरांनी नर्सला गरम दूध व बिस्किटं आणायला सांगितली. त्यानंतर रिचाला इंजेक्शन देऊन झोपवण्यात आलं. नर्सिंग होममधून घरी आल्यावर सुधा सोफ्यावरच आडवी झाली, इतकी ती दमली होती. शरीर थकलं होतं. डोळ्यांपुढे मात्र पन्नास वर्षांपूर्वीचा प्रसंग उभा होता.

बारा तेरा वर्षांच्या सुधाच्या आयुष्यातही असाच प्रसंग घडला होता. खूप उत्साह आणि आनंदात ती मावसबहिणीकडे लग्नाला गेली होती. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजन वगैरे विधी चालू होते. तिला झोप येत होती म्हणून आईने तिला त्यांचं सामान असलेल्या खोलीत झोपायला घेऊन आली. तिला झोपवून आई पुन्हा मांडवात गेली. रात्री कधी तरी सुधाला घुसमटल्यासारखं झालं अन् जाग आली. तिच्या अंगावर कुणीतरी होतं. तिने ओरडू नये म्हणून तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. ती सुटायला धडपडत होती. पण तिची धडपड निष्प्रभ ठरली. खूप त्रास होत होता. सगळं शरीर लचके तोडल्यासारखं दुखत होतं. अर्धबेशुद्धावस्थेत ती कण्हत होती, रडत होती. मग झोप लागली किंवा शुद्ध हरपली. जाग आली तेव्हा आई कपाळाला हात लावून शेजारी बसलेली दिसली. आईला मिठी मारून ती जोराने रडणार तेवढ्यात आईने तिच्या तोंडावर आपल्या हाताचा तळवा दाबून तिचा आवाज व आपलं रडू दाबलं. सकाळी नवरीमुलगी व वऱ्हाडाची पाठवणी झाल्यावर आईने बहिणीला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. बहिणीने स्वत:च्या थोबाडीत मारून घेतलं; कारण संशयाचा काटा मावशीच्या नणंदेच्या मुलाकडे इंगित करत होता. मावशीने अक्षरश: आईचे पाय धरले. ‘‘कृपा करून विषय वाढवू नकोस. पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अळीमिळी गुपचिळी…कुणाला काही कळणार नाही.’’

आपल्या घरी परत आलेली सुधा पार बदलली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तजेला अन् हसू मावळलं होतं. ती सदैव घाबरलेली असायची. बाबांना, दादाला हा बदल खूप खटकला होता. पण सुधाने अवाक्षराने त्यांना काही कळू दिलं नाही.

सुधाच्या ताईने मात्र आईचा पिच्छाच पुरवला तेव्हा आईने तिथे घडलेला प्रसंग सांगितला, सुधा त्यावेळी अंघोळ करत होती अन् बाजारात गेलेले बाबा अन् दादा घरी परतले आहेत हे आईला कळंल नव्हतं. त्यामुळे इतके दिवस कळू न दिलेलं सत्य आता घरात सगळ्यांना कळलं होतं. प्रत्येक जण कळवळला, हळहळला अन् सुधाला आधार देण्यासाठी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला.

बलात्कार एका स्त्रीवर होतो पण मानसिकदृष्ट्या त्या घृणित कृत्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. सुधाने बाहेरच्या जगाशी जणू संबंधच तोडले होते. पण ती अभ्यासात पार बुडाली होती. दहावी, बारावी, बी.एस.सी ऑनर्स, एमएससी फिजिक्स प्रत्येक वर्षीं तिने मेरिटलिस्ट घेतली. बीएससी व एमएसीला तर प्रथम क्रमांक व सुवर्णपदकही मिळवलं. इतके मार्क मिळवायचे तर झोकून देऊन अभ्यास करावाच लागतो. सोशल रिलेशन्समध्ये वेळ घालवून असं मेडल मिळत नाही असं आता लोकच बोलत होते. युनिव्हर्सिटीत तिला नोकरीही मिळाली. इतक्या वर्षांत आता सुधा सावरली. तिचा आत्मविश्वास वाढला पण अजूनही लग्नाला ती नकारच देत होती. दादा व ताईच्या लग्नात करवली म्हणून कौतुक करून घेतलं तरी एरवी कुणाच्याही लग्नाला ती कधी गेली नाही.

बाबांचे खास मित्र घनश्याम काकांचा मुलगा लग्नाचा होता. सुधासाठी सर्वाथाने योग्य होता. बाबांनी डोळ्यात पाणी आणून तिला विनवलं. अक्षरश: तिच्या पाया पडले अन् सुधा हेलावली. लग्नाला कबूल झाली. खूप थाटात लग्न झालं. पण लग्नानंतरही कित्येक वर्ष तिला मूल झालं नाही. रवीने साधा स्पर्श केला तरी ती थरथर कापायची. भितीने पांढरीफटक व्हायची. रवी खरोखर समजूतदार व थोर मनाचा, त्याने तिला समजून घेतलं. तिच्या आईवडिलांशी तो एकांतात बोलला. मानसोपचार सुरू झाले. त्याच्या जोडीने औषधोपचारही सुरू झाले.

रवीचा समजूतदारपणा, त्यांचं प्रेम अन् शारीरिक व मानसिक उपचारांचा चांगला परिणाम झाला. दोन मुलांची आई झालेल्या सुधाने नोकरी, संसार सांभाळून मुलांनाही उत्तम वळण लावलं. त्यांचं शिक्षण, लग्न वेळेवारी होऊन आज ती चार नातवंडांची आजी झाली होती.

अशा घटना विसरू म्हणता विसरता येत नाहीत. त्यावर मुद्दाम कुणी चर्चाही करत नाही. पण सुधाने ठरवलं. आपल्या आयुष्यातली ही घटना ती रिचाला सांगेल…रिचाला बळ मिळेल. शिवाय जे मानसोपचार व इतर उपचार तिने फार उशिरांच्या वयात घेतले ते रिचाला आताच मिळाले तर ती तिचं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे, अधिक आत्मविश्वासाने ती जगू शकेल.

दुसऱ्या दिवशी सुधाने रिचाच्या आवडीचा स्वयंपाक केला व तिचा अन् स्वत:चा डबा घेऊन ती नर्सिंग होममध्ये पोहोचली. आता रिचाचे आईबाबाही सावरले होते. डॉक्टरनेही त्यांना समजावलं होतं. सुधानेही चांगलं बौद्धिक घेतलं होतं. सुधाने त्यांना घरी जाऊन विश्रांती घ्यायला सांगितलं अन् रिच्याजवळ ती दिवसभर राहिल असंही म्हटलं.

सुधाला बघून रिचाला पुन्हा रडण्याचा उमाळा आला. लहानशी, निरागस पोर…पार कोलमडली होती. मनातून काहीतरी वाईट, विपरीत पाप घडल्याची बोच होती. सुधाने प्रथम तिला बरोबर आणलेलं जेवण व्यवस्थित वाढलं. गप्पा मारत आनंदात जेवण करायला लावलं. नर्स येऊन काही गोळ्या देऊन गेली.

‘‘हे बघ रिचा, मी तुझी टीचर आहे. मी आधी कॉलेजात शिकवत होते हे तुला माहिती आहे. पेपरमध्ये माझे लेख अन् फोटो छापून यायचे, दूरदर्शनवर मुलाखत आलेली हे सगळं तुला माहिती आहे. आता मी तुला माझ्या आयुष्यातली एक घटना सांगणार आहे. ती फक्त तुझ्यात अन् माझ्यातच असेल. बाहेर तू कुठेही कुणालाही काही बोलणार नाहीस. घरीही बाबाला आईला काही सांगायचं नाही…प्रॉमिस?’’ सुधाने शांतपणे बोलायला सुरूवात केली.

‘‘प्रॉमिस!’’ रिचाने म्हटलं.

मग आपल्या आयुष्यात घडलेली ती घटना, तो अपघात, त्यामुळे बालमनावर झालेला परिणाम…आई बाबा, ताई दादा सगळ्यांनी दिलेला भक्कम आधार, अभ्यासात गुंतवून घेणं वगैरे सगळं रिचाला समजेल, पटेल अशा पद्धतीने सुधाने सांगितलं. रिचाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव, तिच्या प्रतिक्रिया ती बोलत असताना लक्षपूर्वक बघत होती.

‘‘आणि असे प्रसंग अनेक मुलींच्या बाबतीत घडतात. म्हणून कुणी मरायच्या गोष्टी करत नाही. उलट आपण ठामपणे उभं राहायचं. कारण आपली काही चूकच नाहीए ना? कशाला रडायचं? कशाला मरून जायचं? इतकं सुंदर आयुष्य मिळालंय. चांगलं कुटुंब, घर, आईवडील, मित्रमैत्रिणी सगळं सगळं आहे तुझ्याजवळ मग आपण का रडायचं…तुला काहीही झालेलं नाहीए. तू उद्या घरी  पोहोचशील, त्यानंतर रोजच्यासारखी शाळेत जा. ग्राउंडवर खेळायला जा. समजलं ना? मी जर आज तुला ही घटना सांगितली नसती तर तुला माझ्याकडे बघून कल्पना तरी आली असती का?’’

‘‘मावशी…’’ म्हणत रिचाने सुधाला मिठी मारली.

‘‘उद्यापासून काही दिवस एक डॉक्टर मावशी माझ्याकडे येणार आहे. त्यावेळी मी तुला बोलावून घेईन. तिच्याशी छान गप्पा मारायच्या. काही गोळ्या ती देईल त्या घ्यायच्या. पण हेसुद्धा उगाच कुणाला कळू द्यायचं नाही. ओके?’’

‘‘ओके…’’ रिचाने म्हटलं.

सुधाला खूप हलकंहलकं वाटलं. रिचा अन् तिच्या वयाच्या मुलींना स्वसंरक्षणाचं शिक्षण देण्यासाठी एखादी कराटे कोचही ती बघणार होती. मुलींनी मनाने अन् देहानेही कणखर व्हायलाच हवं अन् मुख्य म्हणजे अशी घटना घडलीच तर त्यामुळे स्वत:ला दोषी समजणं बंद करायला हवं हेही ती शिकणार होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें