समानतेचा काळ

कथा * प्राची भारद्वाज

गिरीश सायंकाळी ऑफिसातून घरी आला, तेव्हा सगळं घर अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. पण आता त्याला या गोष्टीची सवय झाली होती. अशावेळी त्याला चेतन भगतचं वाक्य आठवायचं, ‘‘घरच्या पुरूषानं गरम पोळीचा हट्ट धरला नाही तर त्या घरातली स्त्री घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसह स्वत:चं करियरही उत्तम सांभाळू शकेल,’’ या वाक्यामुळे तो शांत चित्ताने वावरू शकायचा. सुमोनाच्या अन् त्याच्या पहिल्या भेटीत तिनं ऐकवलं होतं, ‘‘माझा स्वत:चा मेंदू आहे तो स्वत:चा विचार करतो अन् त्याप्रमाणेच चालतो.’’

तिचा तडकफडक स्वभाव, तिचा फटकळपणा वगैरे लक्षात आल्यावरही तिच्यावर भाळलेल्या गिरीशनं तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. अन् एकदा लग्न झाल्यावर त्यानं कायम सहकार्यही केलं.

घरकामात तो तिला जमेल तेवढी मदत करायचा. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तो वॉशिंगमशीनमधून कपडे धुवून वाळत घालायचा. तेवढ्या वेळात सुमोना दोघांचे डबे अन् ब्रेकफास्ट बनवायची. बाई नाही आली तर सुमोना केरफरशी करायची, तोवर तो भांडी धुवून ठेवायचा. पण त्याला स्वयंपाकघरात मात्र काही करता येत नव्हतं. एकटा कधीच राहिला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर स्वयंपाक करायची वेळच आली नव्हती. आधी आईच्या हातचं जेवायचा. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, तेव्हा अॅफिसच्या कॅन्टीनचं जेवण जेवू लागला. तेवढ्यात घरच्यांनी लग्न करून दिलं अन् सुमोनानं स्वयंपाकघर सांभाळलं.

घरात आल्यावर एक ग्लास गार पाणी पिऊन गिरीश घर आवरू लागला. अजून सुमोना घरी आली नव्हती. आज बाईनं दांडी मारली. त्यामुळे सकाळी अगदी गरजेचं तेवढंच घरातलं आटोपून दोघंही ऑफिसला गेली होती.

‘‘अरे, तू कधी आलास? मला यायला जरा उशिरच झाला.’’ घरात येता येता सुमोनानं म्हटलं.

हॉलमधलाला पसारा आवरत गिरीश म्हणाला, ‘‘हा काय एवढ्यातच आलोय, जेमतेम पंधरा मिनिटं झाली असतील.’’

‘‘आज आमच्या टीममध्ये पुन्हा जोरदार वादविवाद झाला. त्यामुळेच थोडा उशीर झाला. त्या संचितला ओळखतास ना?’’

तो म्हणाला, ‘‘बायकांना प्रमोशन सहज मिळतं…बस्स, बॉसकडे हसून बघायचं की मिळालं प्रमोशन…’’ हे काय बोलणं झालं? मला रागच आला…मीही ऐकवलं त्याला, ‘‘आम्ही ही अभ्यास करतो, मेहनतीनं चांगले मार्क मिळवून डिग्री घेतो अन् कॉम्पिटिशनमध्ये बरोबरीनं राबून नोकरीतलं प्रमोशन मिळवतो. खरं तर आम्हालाच उलट घर, मुलं अन् नोकरी सांभाळताना जास्त श्रम करावे लागतात. ग्लास सीलिंगबद्दल ऐकलं नाहीए बहुतेक.’’

‘‘तू मानतेस ग्लास सीलिंग? तुला तर कधीच कुठल्या भेदभावाला सामोरं जावं लागलं नाहीए?’’

‘‘मला सामोरं जावं लागलं नाही कारण मी एक समर्थ, सशक्त स्त्री आहे. मी अबला नाही. कुणा पुरूषानं माझ्याशी स्पर्धेत जिंकून दाखवावं…’’

‘‘बरं बाई, पण आता या पुरूषावर कृपा करून अत्याचार करू नकोस. जरा लवकर जेवायवा घाल.’’ गिरीशला भयंकर भूक लागली होती.

‘‘आता? एवढयात ग्लास सीलिंगबद्दल बोललो ना आपण? मी ही एवढ्यातच ऑफिसातून आले आहे. मी ही दमले आहे अन् तुला…’’

‘‘काय करू? जेवायखायच्या बाबतीत तुझ्यावरच आश्रित आहे मी…एरवी मदत करतंच असतो ना? आता तुझ्यावर अत्याचार करतो असा चेहरा करू नकोस, फक्त खिचडी केलीस तरी चालेल.’’

सुमोनानं नाइलाजानं स्वयंपाक केला, कारण मागे दोन तीनदा तिनं उशीर झाल्यामुळे बाहेरून जेवण मागवलं होतं. तेव्हा गिरीशचं पोट बिघडलं हातं. गिरीश स्वच्छताप्रिय होता तर सुमोनाला घरातली घाण किंवा पसारा त्रासदायक वाटत नसे. जेवायच्या टेबलावरचा पसारा ती मजेत सोफ्यावर ढवळून जेवण मांडायची, अन् हॉलमध्ये बसायच्यावेळी सोफ्यावरचा पसारा पुन्हा डायनिंग टेबलवर ठेवायची.

गिरीशनं काही म्हटलंच तर उलटून म्हणायची, ‘‘इतकं खटकतंय तर तूच ठेवा ना उचलून… मीही तुझ्यासारखीच नोकरी करतेय. ऑफिस सांभाळतेय. ऑफ्टर ऑल समानतेचा काळ आहे. स्त्री-पुरूष समान आहेत.’’

एकदा गिरीशची आई आली होती. दोघांमधलं हे असं संभाषण ऐकून तिला राहवलं नाही. ती म्हणाली, ‘‘बरोबरीचा मुद्दा अगदी बरोबर आहे. समानता असायला हवीच. पण एकूणच घर, संसार, समाज नीट चालण्यासाठी काही कामं स्त्रीपुरूषांमध्ये विभागली गेली आहेत. दोघांनी मिळून कामं करावीत हे बरोबर आहे. पण तरीही काही क्षेत्र ही स्त्रियांची अन् काही पुरूषांची असतात.’’

त्यांचं बोलणं तिनं एका कानानं ऐकलं अन् दुसऱ्यानं सोडून दिलं.

सुमोनाचा हेकेखोरपणाही गिरीश सहन करत होता. त्यांच्या खोलीत त्यानं सुमोनाला मिठीत घेतलं तरी ती त्याला झिकारायची, ‘‘मी पुढाकार घेईन याची वाट का बघत नाहीस तू? प्रत्येक वेळी तुझीच मर्जी का म्हणून?’’

‘‘मी तुझ्यावर बळजबरी करत नाहीए सुमोना, तुझीइच्छा नसेल तर राहील…’’

‘‘माझ्यावर बळजबरी कुणीच करू शकणार नाही…तूसुद्धा!’’

‘‘अगं मीही तेच म्हणतोय ना? मी बळजबरी करत नाहीए…यात भांडायचं कशाला?’’ सुमोनाच्या अशा आठमुठ्या अन् आखडू वागण्यानं गिरीश त्रस्त होता.

काही महिन्यांनंतर सुमोनाची आई त्यांच्याकडे आली. मुलीचा संसार बघून तिला बरं वाटलं. पण त्यांच्यासमोर बरेचदा गिरीश सुमोनाची बरोबरीची, समानतेची वादावादी झाली. गिरीशला अचानक ऑफिसच्या टूरवर जावं लागलं. त्यानं ऑफिसातून सुमोनाला फोन केला, ‘‘जरा माझी बॅग भरून ठेव ना, प्लीज…’’

‘‘अरे व्वा? सरळ हुकूम करतोय बॅग भरून दे म्हणून. मला माझी कामं नाहीत का? स्वत:च काम स्वत: करायला काय झालं? त्याला टूरवर जायचंय तर त्यानं लवकर घरी येऊन आपली बॅग भरून घ्यावी. लग्नाच्या आधीही करतच होता ना स्वत:चं काम? ऑफ्टर ऑल समानतेचा काळ आहे. बरोबरीचे हक्क आहेत.’’

सुमोनाच्या आईला तिचं हे वागणं खटकलं, ‘‘हे काय सुमोना? तू त्याची बायको आहेस, त्याचं काम तूच नको का करायला? घर, संसार मिळावा म्हणून पुरूष लग्न करतो. एकटं राहायचं तर लग्नाची गरजच काय? उद्या तू म्हणशील मुलं मीच का जन्माला घालायची? गिरीशनं घालावीत.’’

‘‘तू तर माझ्या सासूसारखीच बोलते आहेत,’’ आईचं बोलणं सुमोनाला आवडलं नाही.

आई प्रेमाने म्हणाली, ‘‘अगं, आई असो की सासू, तुला सांगतील ते चांगलंच सांगतील. त्यांच्याकडे अनुभव असतो जगाचा, संसाराचा. म्हणून त्यांचं म्हणणं ऐकावं.’’

‘‘पण आई, मी ही त्याच्यासारखीच शिकलेली आहे. गिरीशसारखीच माझीही नोकरी आहे, त्याच्या एवढंच कमावते आहे, मग मी एकटीनंच का संसार ओढायचा? तुला ठाऊक आहे की मी नेहमीच स्त्री मुक्तीची अन् स्त्रीपुरूष समानतेची समर्थक होते अन् आहे.’’

‘‘तू थोडा अतिरेक करते आहेस सुमोना. अगं स्त्रीवाद म्हणजे पुरूषांशी वैर करणं किंवा सतत भांडण करणं नाही. संसार पतिपत्नीच्या समंजपणानं अन् सहकार, सहचार्याने चालतो. गिरीश तर तुला खूपच समजून घेतो. सहकार्य करतो, नुसती त्यानं बॅग भरून दे म्हटलं तर इतकं आकांडतांडव कशाला?’’

आईचं म्हणणंही सुमोनानं उडवूनच लावलं.

लग्नाला वर्ष होता होता गिरीशनं स्वत:ला सुमोनाच्या अपेक्षेनुरूप बदल घडवून आणला होता. त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं अन् बायकोला सुखात ठेवावं, तिनं सुखी रहावं अशी त्याची इच्छा होती. पण सुमोनाचा स्त्रीवाद काही थांबायला तयार नव्हता. गिरीशचे काही सहकारी घरी आले होते. त्यांच्या ऑफिसच्या गप्पा सुरू झाल्या, तेव्हा त्यांच्या बॉसचा विषय निघाला. ‘‘बॉस मॅडम इतक्या आखडू का आहेत? तेच कळत नाही. सरळ शब्दात तर त्या बोलतच नाहीत.’’

गिरीशच्या एका मित्रानं एवढं म्हटलं अन् सुमोना अशी बिथरली…‘‘एका स्त्रीला बॉस म्हणून सहन करणं तुम्हा पुरूषांना कसं मानवेल? हाच बॉस पुरूष असता तर त्याला सहन केलंच असतं ना? पण इथं एक स्त्री आहे तर लागले तिची चेष्टा करायला, तिला नावं ठेवायला…तिच्याशी जमवून घ्यायला नको का तुम्ही हाताखालच्या लोकांनी?’’

‘‘अरेच्चा? वहिनींना एकाएकी काय झालं?’’ सगळेच चकित झाले.

तिच्या वागण्यानं गिरीशही वैतागला…‘‘सुमोना, तू आम्हा सर्वांना ओळखतेस, आमच्या बॉसला तू बघितलंही नाहीस अन् तिची कड घेते आहेस?’’ त्यानं म्हटलं.

एव्हाना गिरीशच्या लक्षात आलं होतं की सुमोनाच्या मनात पुरूषांविषयी विनाकारण राग आणि द्वेष आहे. ती पुरूषाला बाईचा शत्रूच मानते. स्वत:ला ती श्रेष्ठ स्त्री समजते अन् घरातल्या कामातही विनाकारण बरोबरी, समानता हे विषय आणत असते.

एका रात्री गिरीश, सुमोना जेवायला बाहेर गेली होती. सुमोनाच्या आवडत्या हॉटेलात, तिच्या आवडीचे पदार्थ होते. जेवण झाल्यावर दोघं त्यांच्या गाडीत बसून घरी यायला निघाली. तेवढ्यात तीन मोटरसायकलवर ८-९ जणांचं टोळकं त्यांच्या गाडीच्या मागे लागलं. मोठमोठ्यानं अचकट विचकट बोलत, आरोळ्या ठोकत ते शिट्याही वाजवत होते.

‘‘मी आधीच म्हटलं होतं. या रस्त्यानं नको जाऊयात. तुम्हाला हाच रस्ता नेमका का घ्यावासा वाटला? आता काय करायचं?’’ सुमोना खूपच घाबरली होती.

‘‘काय करणार? घाबरायचं नाही. ऑफ्टर ऑल हा समानतेचा काळ आहे?’’

गिरीशचं बोलणं ऐकून सुमोना गारच पडली. तिचं वाक्य आज गिरीशनं म्हटलं होतं.

घाबरलेल्या सुमोनानं गिरीशला म्हटलं, ‘‘गिरीश, तू माझा नवरा आहेस, मला सुरक्षित ठेवणं ही तुझीच जबाबदारी आहे. बरोबरी समानता आपल्या जागी अन् मला सुरक्षित ठेवणं, गुंडांपासून वाचवणं आपल्या जागी. तुला तुझं कर्तव्य करावंच लागेल.’’

गिरीशनं काही उत्तर दिलं नाही. फक्त गाडीचा स्पीड एकदम वाढवला अन् काही मिनिटातच गाडी सरळ पोलीस चौकीत येऊन थांबली. तिथं पोहोचताच ते टोळकं त्यांच्या मोटरसायकलसह पळून गेलं. शांतपणे गिरीशनं गाडी मुख्य रस्त्यावर आणून सरळ घर गाठलं. दोघांनीही हुश्श केलं. कुणीच काहीही बोललं नाही. गिरीश गप्प होता कारण त्याला सुमोनाला विचार करायला वेळ द्यायचा होता. सुमोना गप्प होती. कारण आज तिला तिची चूक उमगली होती.

सकाळी दोघं उठून आपापलं आवरून ऑफिसला निघून गेली. संभाषण नव्हतंच, मात्र अबोला भांडणातून आलेला नसल्यानं तणाव जाणवत नव्हता. ऑफिसात काम करताना तिच्या कॉम्प्युटरवर गिरीशचा मेसेज दिसला.

‘‘सुमोना, तू हिंदीतल्या ख्यातनाम कवींचं नाव ऐकलं आहे? विनोदी कवी म्हणून काका हाथरसी ओळखले जातात. त्यांचीच ही कविता आहे :-’’

‘दुलहन के सिंदूर से शोभित हुआ ललाट, दूल्हेजी के तिलक को रोली हुई अलौट. रोली हुई अलौट, टौप्स, लौकेट, दस्ताने, छल्ला, बिछुआ, हार, नाम सब हैं मर्दाने. लालीजी के सामने लाला पकड़े कान, उन का घर पुर्लिंग है, स्त्रीलिंग दुकान. स्त्रीलिंग दुकान, नाम सब किस ने छांटे, काजल, पाउडर हैं पुर्लिंग नाक के कांटे. कह काका कवि धन्य विधाता भेद न जाना, मूंछ मर्दों की मिली किंतु है नाम जनाना…

अर्थात, स्त्री अन् पुरूषातला झगडा सनातन आहे. तरीही दोघं एकमेकांचे पुरक, सहाय्यक आहेत ही गोष्ट तेवढीच खरी आहे. ज्यांना हे कळत नाही, त्यांचं सोड, पण नवरा बायकोनं एकमेकांशी भांडणं, सतत बरोबरी करणं यानं कोणताच संसार सुखी होत नाही. सुखी संसारातच वंशवेल विस्तारते. घरातल्या मुलांनाही चांगले संस्कार मिळतात. सुमोना, तुझ्या तकलादू स्त्री वादातून बाहेर पड. मी स्वत: स्त्रियांचा सन्मान करतो हे तू जाणतेस. माझं प्रेम ओळख,. त्यातला खरेपणा जाणून घे…’’

त्या सायंकाळी गिरीश घरी आला, तेव्हा टेबलवर गरमागरम जेवण तयार होतं. छानपैकी नटलेली सुमोना हसऱ्या चेहऱ्यानं त्याची वाट बघत होती. तो आत येताच तिनं त्याला मिठी मारली अन् ती म्हणाली, ‘‘माझॆ काम मी केलंय हं! आता तुझी पाळी.’’

जेवण झाल्यावर गिरीशनं सुमोनाला उचलून घेतलं अन् तो बेडरूमकडे निघाला. हसऱ्या चेहऱ्यानं सुमोना त्याला बिलगली.

श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या

* सोमा घोष

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, सोनी मराठीचे बिझनेस हेड श्री. अजय भाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर, आनंद काळे हे उपस्थित होते. मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून १५  नोव्हेंबरपासून , सोम.-शनि. संध्या.  ७:३०  प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

करारी नजर, स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभते आहे. स्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहे.             डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्‍या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे.

जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे; हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. ‘मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतात, त्याच हाताने गर्दनही मारू शकतात!’ ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे.

१५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे! पहायला विसरू  नका स्वराज्य सौदामिनी ताराराणी , सोम.-शनि.संध्या. ७:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

प्रमुख उपस्थिती

डॉ. अमोल कोल्हे – (मालिकेचे निर्माते)

श्री. अजय भाळवणकर – (बिझनेस हेड, सोनी मराठी)

उपस्थित कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा

स्वरदा थिगळे – स्वराज्य सौदामिनी ताराराणी

यतीन कार्येकर- औरंगजेब

संग्राम समेळ- छत्रपती राजाराम राजे

संताजी घोरपडे – अमित देशमुख

धनाजी जाधव – रोहित देशमुख

हंबीरराव मोहिते – आनंद काळे

शॉर्ट कट

कथा * आशा आर्या

अरे देवा! पुन्हा एक नवा ग्रुप…सगळं जग जणू व्हॉट्सएपमध्ये आवळून बांधलंय. ‘सितारे जमीं पर’ नाव असलेला हा ग्रुप नसरीनला आत्ताच दिसला होता. कॉलेजात जाण्यापूर्वी नित्याच्या सवयीप्रमाणे ती व्हॉट्सएप मेसेजेस चेक करत होती.

या व्हॉट्सएपचीही शेवटी सवयच लागते. सवय काय, खरंतर व्यसन म्हणायलाही हरकत नाही. बघितलं नाही, तर नेमकं काही तरी अति महत्त्वाचं आपल्याला कळत नाही. कुठल्याशा ग्रुपमधून तर एकाच दिवसात शेकडो मेसेजेस येतात…बिच्चारा मोबाइल हँग होतो. त्यातले निम्मे तर फुकटचं ज्ञान वाटणारे कॉपीपेस्टच असतात. उरलेले गुडमॉर्निंग, गुडइव्हिनिंग, गुडनाईटसारखे निरर्थक असतात. येऊनजाऊन एखादाच मेसेज दिवसभरात कामाचा सापडतो. पण येताजाता उगीचच मेसेज चेक करायचा, चाळाचा असतो मनाला. विचार करता करता नसरीन भराभर मेसेजेस चेक करत होती, डिलीटही करत होती.

बघूया तरी या नव्या ग्रुपमध्ये काय विशेष असेल? ओळखीच्यापैकी कुणी असेल का? अॅडमिन कोण असेल? तिनं नव्या ग्रुपच्या इन्फोवर टॅप केलं. आत्ता तरी या ग्रुपमध्ये १०७ लोक जॉइन झालेले आहेत. स्क्रोल करता करता तिची बोटं अचानक एका नावावर थांबली. राजन? ग्रुप अॅडमिनला ओळखताच ती आनंदानं चित्कारली.

हा राजन तर ‘फेस ऑफ द ईयर कॉन्टेस्ट’चा आयोजक आहे. याचाच अर्थ तिचा प्रोफाइल पहिल्या पातळीवर निवडला गेला आहे. नसरीनला आनंद झाला.

नसरीन जयपूरला राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुबातली एक मुलगी. पण तिची महत्त्वाकांक्षा जबरदस्त होती. उंच, गोरी, शेलाटी, आकर्षक चेहरा अन् धीटपणा असणारी ही मुलगी. तिच्या उड्या मोठ्या आहेत अन् त्यासाठी हवं ते करायची तयारी आहे. रूढीवादी समाजानं लादलेली बंधनं तिला मान्य नाहीत. ती चक्क बंडखोरी करते. तिला मॉडेल बनायचं आहे. पण तिच्या जुनाट विचारांच्या कुटुंबात भाऊ व आई तिला सतत बंधनात ठेवतात. वडिलांची ती लाडकी आहे. ते तिला काहीच म्हणत नाहीत. आई तिच्यासाठी मुलगा शोधतेय. नसरीनला लग्न मुलं बाळं काहीही नकोय. तिच्या बरोबरीच्या मुलींना तिचं बिनधास्त वागणं, फॅशनेबल राहणं या गोष्टींचा मत्सर वाटतो. पण तसं स्वत:ला राहता आलं तर त्यांना आवडलंच असतं.

गावातली वयस्कर मंडळी आणि मौलानासाहेब तिच्या वडिलांना दटावून चुकली आहेत, ‘‘तुमच्या मुलीला आवरा. तिच्यामुळेच समाजातल्या इतर मुली बिघडतील.’’ त्यामुळेच नसरीनच्या अब्बांनी तिला सर्वांच्या नजरेपासून दूर जयपूरला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायला पाठवलं आहे.

एक दिवस तिनं कॉलेजच्या नोटीस बोर्डवर एक सर्क्युलर बघितलं. राजनच्या कंपनीनं ‘फेस ऑफ द ईयर कॉन्टेस्ट’ आयोजित केली होती. राजनच्या कंपनीतून निवडल्या गेलेल्या स्त्री-पुरूष मॉडेल्सना मार्केटमध्ये मागणी होती. ही स्पर्धा वेगवेगळ्या राऊंडमधून होती. शेवटची फेरी मुंबईत होती. निवडल्या गेलेल्या मॉडेलला दहा लाख रूपये बक्षिस होतं. शिवाय एक वर्षांचं मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्टही नसरीननं ठरवलं या स्पर्धेत उतरायचं. कुणी गॉडफादर नसताना हे धाडस करणं तसं धोक्याचं होतं. पण नसरीननं आपली एंट्री पाठवली. बघूया योग असेल तर पुढला रस्ताही दिसेल.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात राजनचं नाव मोठं होतं. त्याच्याबद्दल बरेच प्रवादही होते. पण त्याच्यासाठी मॉडेलिंग करणं हे प्रत्येक नवोदित मॉडेलचं स्वप्नं होतं. आज राजनच्या या ग्रुपमध्ये स्वत:ला सम्मिलित करताना नसरीनला लॉटरी लागल्याचा आनंद झाला होता. नीरस व्हॉटस्एप आता मजेदार वाटू लागला होता.

‘‘आता अगदी प्रत्येक गोष्ट खूप विचारपूर्वक अन् शिस्तबद्ध पद्धतीनं करायला हवी.’’ तिनं स्वत:लाच समज दिली. सर्वात आधी तिनं व्हॉटसएप प्रोफाइलच्या डीपीवरचा आपला जुना फोटो काढून तिथं एक नवा सेक्सी अन् हॉट फोटो टाकला. मग राजनला पर्सनल चॅट बॉक्समध्ये ‘थँक्स’चा मेसेज टाकला.

प्रत्युत्तरात राजननं दोन्ही हात जोडून केलेल्या नमस्काराचे स्माइलही टाकले. हा राजनशी तिचा पहिला चॅट होता.

दुसऱ्यादिवशी नसरीननं आपले काही फोटो राजनच्या इन बॉक्समध्ये टाकले अन् ताबडतोब ‘‘सॉरी, सॉरी चुकून पाठवले गेले, तुम्हाला पाठवायचे नव्हते.’ असंही लिहून पाठवलं.

राजनचा मेसेज आला, ‘‘इट्स ओके. बट यू आर लुकिंग व्हेरी सेक्सी.’’

‘‘सर, यावेळी मी जगातली सर्वात आनंदी मुलगी आहे, कारण तुमच्यासारख्या किंग मेकरशी संवाद साधते आहे.’’

‘‘मी तर एक साधासा सेवक आहे कलेचा.’’

‘‘हिऱ्याला स्वत:चं मोल कळत नाही म्हणतात.’’

‘‘तुम्ही विनाकारण मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय.’’

‘‘खरं आहे तेच सांगतेय.’’

राजननं पुन्हा ती नमस्काराची धन्यवाद दर्शवणारी मुद्रा पाठवली.

‘‘ओके, बाय सर, उद्या भेटूयात,’’ दोन स्माइली पाठवून नसरीननं चॅटिंग थांबवलं.

दोन दिवसांनी स्पर्धेचा पहिला राऊंड होता. नसरीनने राजनला लिहिलं, ‘‘सर, ही माझी पहिली संधी आहे, आपली मदत असेल ना?’’

‘‘हे तर काळच सांगेल किंवा तू.’’ राजननं जणू तिला हिंट दिली.

नसरीनच्या लक्षात आलं ते. ‘‘ही कॉन्टेस्ट मला जिंकायचीच आहे…कोणत्याही किंमतीवर.’’ नसरीननं लिहिलं जणू तिच्याकडून तिनं हिरवा झेंडा दाखवला होता.

संपूर्ण देशातून आलेल्या साठ मॉडेल्सपैकी पहिल्या राउंडमधून वीस मुलींची निवड करण्यात आली. त्यात नसरीन होती. तिचं अभिनंदन करण्यासाठी राजननं तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. ही तिची राजनशी प्रत्यक्ष झालेली पहिली भेट होती. तो फोटोत दिसतो, त्यापेक्षाही प्रत्यक्षात अधिक सुंदर आणि आकर्षक आहे हे तिला जाणवलं. केबिनमध्ये तिचे गाल थोपटत त्यानं विचारलं, ‘‘बेबी, हाऊ आर यू फिलिंग नाऊ?’’

‘‘हा राऊंड क्वालिफाय केल्यावर की तुम्हाला भेटल्यावर?’’ खट्याळपणे नसरीननं विचारलं.

‘‘स्मार्ट गर्ल.’’

‘‘पुढे काय होणार?’’

‘‘सांगितलंय ना, ते तुझ्यावर अवलंबून आहे.’’ तिच्या उघड्या पाठीला हलकेच स्पर्श करत तो म्हणाला.

‘‘ते तर झालंच, पण आता कॉम्पिटिशन अधिकच तीव्र होईल.’’ त्याच्या स्पर्शाचा बाऊ न करता ती म्हणाली.

‘‘बेबी, तू एक काम कर.’’ तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा मागे सारत तो म्हणाला, ‘‘दुसऱ्या राउंडला अजून दहा दिवस आहेत. तू रोनित शेट्टीचा पर्सनॅलिटी ग्रूमिंगचा क्लास करून घे. मी त्याला फोन करतो.’’

‘‘सो नाइस ऑफ यू…थँक्स,’’ म्हणत तिनं त्याच्याकडून रोनितचं कार्ड घेतलं.

दहा दिवसांनी दुसऱ्या राउंडमध्य निवडल्या गेलेल्या दहा मॉडेल्समध्ये नसरीनचा समावेश होता.

फायनल स्पर्धा मुंबईत होती. जजेसमध्ये राजनखेरीज एक प्रसिद्ध टीव्ही एक्ट्रेस अन् एक प्रसिद्ध पुरूष मॉडेल अशी मंडळी होती.

सर्व स्पर्धकांसोबत नसरीन मुंबईला आली. त्यांची खास व्यवस्था करण्यात आली होती. राजननं मेसेज करून तिला आपल्या खोलीत बोलावलं.

‘‘सो बेबी, तू काय ठरवलं आहेस?’’

‘‘त्यात ठरवायचं काय? हे एक डील आहे. तुम्ही मला खुश करा. मी तुम्हाला खुश करेन.’’ धीटपणे नसरीननं म्हटलं.

‘‘ठीकय तर मग, रात्रीच डीलवर शिक्कामोर्तब करू या.’’

‘‘आज नाही…उद्या…रिझल्टनंतर.’’

‘‘माझ्यावर विश्वास नाहीए?’’

‘‘विश्वास आहे. पण माझ्याकडेही सेलिब्रेट करायला काही कारण हवं ना?’’ त्याला हलकेच दूर सारत ती म्हणाली.

‘‘अॅज यू विश…ऑल द बेस्ट,’’ तिला निरोप देत राजननं म्हटलं.

दुसऱ्यादिवशी वेगवेगळ्या तिन्ही राउंडनंतर फायनल निर्णय डिक्लेर झाला अन् नसरीन ‘‘फेस ऑफ द ईयर’’ म्हणून निवडली गेली. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात गेल्या वर्षीच्या विनरनं नसरीनच्या डोक्यावर मुकुट घातला.

आनंदानं नसरीनचे डोळे भरून आले. तिनं कृतज्ञतेनं राजनकडे बघितलं. राजननं डोळा मारून तिला रात्रीच्या डीलची आठवण करून दिली. नसरीन प्रसन्न हसली.

त्या रात्री नसरीननं आपला देह राजनच्या हवाली करून यशाच्या मार्गावरचा एक शॉर्टकट निवडला. त्या वाटेवरचं पहिलं पाऊल टाकताना तिच्या डोळ्यांतून दोन गरम अश्रू ओघळले अन् उशीवर उतरून दिसेनासे झाले.

स्पर्धा जिंकल्यावर सगळ्याच माध्यमांनी तिचा उदोउदो केला. स्पर्धेनंतर प्रथमच ती जयपूरला आली, पण कट्टरपंथी समाजाच्या लोकांनी तिचा निषेध केला. काळे झेंडे दाखवले. मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तसे फलकही ते दाखवत होते. तिचा भाऊच त्यात अग्रभागी होता. ती स्टेशनवर उतरू शकली नाही. दूरवर उभे असलेले तिचे अब्बा असहायपणे बघत होते. त्यांचे डोळे डबडबले होते. त्यांनी हात हलवून तिला शुभेच्छा दिल्या. ट्रेन पुढे सरकली. त्यानंतर ती कधीच जयपूरला गेली नाही.

बघता बघता जाहिरातींच्या विश्वात नसरीनचं नाव झालं. पण अजूनही तिच्या मनातला मुक्काम ती गाठू शकली नव्हती. तिला आता इंटरनॅशनल स्पर्धेत उतरायचं होतं. राजनच्या आधरानं तेवढी मोठी झोप घेता येणार नव्हती. तिला आता अधिक भक्कम आधाराची गरज होती.

एक दिवस तिला समजलं की फॅशन जगतातले अनभिषिक्त सम्राट समीर खान यांना इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी एक नवा फ्रेश चेहरा हवा आहे. तिनं सरळ समीर खान यांची अपॉइंटमेंट घेतली अन् त्यांच्या ऑफिसात पोहोचली. थोड्या औपचारिक गप्पा झाल्यावर सरळ मुद्दयावर येत समीरनं म्हटलं, ‘‘बेबी, हा एक बीच सूट आहे. बीच सूट कसा असतो हे तुला माहीत असेल…आय होप!’’

‘‘यू डोंट वरी सर, जसं तुम्हाला हवंय, तसं होईल.’’ नसरीननं त्यांना आश्वस्त केलं.

‘‘ठीक आहे, पुढल्या आठवड्यात ऑडिशन आहे, पण त्यापूर्वी तुझं हे शरीर बीच सूटसाठी योग्य आहे की नाही हे मला बघावं लागेल,’’ समीरनं म्हटलं.

त्याच्या म्हणण्याचा गर्भित अर्थ नसरीनला समजला. ती शांतपणे म्हणाली, ‘‘प्रथम ऑडिशन घेऊन ट्रेलर बघा. त्यावरून अंदाज आला की पूर्ण पिक्चर बघा…’’

‘‘वॉव! ब्यूटी विथ ब्रेन,’’ समीरनं तिच्या गालांवर थोपटत म्हटलं.

या प्रोजेक्टसाठी नसरीनची निवड झाली. या दरम्यान तिचा संपर्क राजनशी कमी होऊ लागला होता. एक महिन्यानंतर तिला समीरच्या टीमसोबत परदेशी जायचं होतं.

राजननं तिला डीनरसाठी बोलावलं होतं. नसरीन जाणून होती. ती रात्री त्याच्याकडे गेली की तो सकाळीच तिला सोडेल. पण तरीही या क्षेत्रात यायला तिला राजननं मदत केली होती. त्याच्याविषयी तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होताच.

‘‘तू समीर खानसोबत जाते आहेस?’’

‘‘हं!’’

‘‘मला विसरशील?’’

‘‘मी असं कधी म्हटलं?’’

‘‘तुला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाहीए…तो फार लबाड आहे. नित्य नवी मुलगी लागते त्याला.’’

‘‘मी तुम्हाला तरी कुठे ओळखत होते?’’

‘‘तुला उडायला आता आकाश कमी पडतंय…’’

‘‘तुम्ही माझ्यावर प्रेम तर करत नाही ना?’’ नसरीननं वातावरणातला ताण कमी करण्यासाठी हसत विचारलं.

तिच्या डोळ्यात बघत गंभीरपणे राजननं म्हटलं, ‘‘जर मी ‘हो’ असं उत्तर दिलं तर?’’

‘‘तुम्ही असं म्हणू नका.’’

‘‘का?’’

‘‘कारण फॅशनच्या क्षेत्रात प्रेम बीम नसतंच. तुमची कंपनी पुन्हा फेस ऑफ ईयर ऑर्गनाइज करते आहे. पुन्हा एक नवा चेहरा निवडला जाईल. ज्यामुळे तुमच्या कंपनीची अन् तुमच्या अंथरूणाची शोभा वाढेल. मग वर्षभर तुम्ही तिच्यातच बिझि राहाल. माझ्या माथ्यावर मुकुट घालताना मी त्या मॉडेलच्या डोळ्यांत जे दु:ख बघितलं, ते मला माझ्या डोळ्यात येऊ द्यायचं नाहीए.’’ अत्यंत शांतपणे पण स्पष्ट शब्दात नसरीननं आपलं म्हणणं मांडलं होतं.

राजन चकित नजरेनं तिच्याकडे बघत होता. इतका विचार करणारी मुलगी त्याला आजवर भेटली नव्हती.

नसरीन पुढे बोलली, ‘‘राजन, माझं ध्येय अजून बरंच लांब आहे. त्या वाटेवर तुमच्यासारखे अनेक लहान लहान थांबे येतील. मी तिथं थोडी विश्रांती घेईन, मात्र थांबून राहू शकत नाही.’’

रात्र सेलिब्रेट करण्याचा राजनचा उत्साह पार ढेपाळला. ‘‘चल, तुला गाडीपर्यंत सोडतो.’’

‘‘ओके. बाय बेबी, दोन दिवसांनी माझी फ्लाइट आहे. बघूया, पुढला मुक्काम कुठं असेल.’’ असं म्हणून नसरीननं आत्मविश्वासानं गाडी स्टार्ट केली.

तिची गाडी दिसेनाशी होई तो राजन तिकडे बघत उभा होता.

‘बेटेसे बाप सवाई’

कथा * रेखा नाबर

अनिरूद्धला स्काईपवर आलेलं पाहून नाना अंचबित झाले.

‘‘नानी, अनिरूद्ध आहे स्काईपवर, या लवकर.’’

‘‘नाना, आश्चर्य चकित झालात ना?’’

‘‘साहजिकच आहे. परवाच तर बोललो आपण.’’

‘‘सगळं ठिक आहे ना तिकडे?’’ नानींची मातृसुलभ चिंता.

‘‘हो, सगळं उत्तम आहे. तुम्ही नेहमी म्हणता ना नविन तंत्रज्ञानाने जग लहान झालं. पण नाती दुरावली. संवाद आटला. म्हणूनच आज पुन्हा संपर्क साधला.’’

‘‘हे ‘दुधाची तहान ताकावर…’ असं झालं. सोबत राहीलात तर काहीतरी चांगलं चुगंलं करून घालेन. उतरत्या वयात तुमच्या मायेचा ओलावा सुखावेल. पण कसलं काय? तू अमेरिकेला आणि अनिता लंडनला. आम्ही भारतात असा त्रिकोण.’’ नानींची प्रेमळ व्यथा.

‘‘नानी, आता तुझ्या सर्व तक्रारींना पूर्णविराम मिळणार आहे. आम्ही लवकरच येतोय तिकडे. अन्यालासुद्धा कळवलंय. ती येणार आहे.’’

‘‘अगंबाई, सगळीच येणार. मुलेबाळे येता घरा तोची दिवाळी दसरा.’’

नानींनी मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. अनिरूद्ध व पत्नी अचला तर अनिता आपल्या अद्वैत, आराध्य या मुलांसहीत हजर झाली. अनिता तिच्या दिरांकडे दादासाहेबांकडे राहिली.

‘‘अनि, सहा महिन्यांपूर्वी तू आला होतास. लगेच रजा कशी मिळाली.’’ नानींनी विचारलं.

‘‘थोडीशी रजा आणि इथूनच काम करणार आहे. यावेळी मी एक प्रस्ताव घेऊन आलोय. म्हणजे तुम्हाला घेऊन जाण्याचा.’’

‘‘गेल्यावर्षीच चांगले तीन महिने राहून आलो की.’’ नानांनी विचारलं.

‘‘तसं नाही नाना. आता तुम्ही दोघे कायमचेच चला. एकत्र राहू या. इकडे तुम्ही दोघांनीच राहणं सुरक्षित नाही. शिवाय तुमच्या तब्येतीची काळजी वाटते ना! नुकतंच मी मोठं घर घेतलंय. छान बाग आहे. भरपूर मोकळी जागा. अगदी हवेशीर आहे. अचला, फोटो दाखव.’’

घराचे, आतील सर्व खोल्यांचे फोटो पाहून नाना, नानी व अनिता हरखूनच गेले.

‘‘एकदम सही घर घेतलेयस रे दादीहल्या. नानानानींची रूम ढासूच.’’

‘‘हो ना? नाना नानी तुम्ही मस्त आरामात राहा. वीकेएन्डला आपण आऊटिंगला जात जाऊ.’’

‘‘नाही रे अनि. इकडची नाळ तोडून कायमचं तिकडे यावं असं नाही वाटत.   आमचं सोशल लाईफ, योग केंद्र, इथले नातेवाईक, सण, समारंभ सगळ्यानांच मुकावं लागणार.’’

‘‘नाना, तिकडेसुद्धा महाराष्ट्र मंडळ आहे. आपल्या घराजवळच आहे. त्यात विविध कार्यक्रम होतात. आम्ही जातो कधीकधी. तुम्ही जात जा नियमित.’’ अचलाने समजूत घातली.

‘‘बघतो विचार करून. आम्हाला वाटलं तूच कायमचा इथे येतोयस.’’

‘‘नाना, इथे यायचं म्हणजे सगळी सुरूवात इथली पहिल्यापासून. जीवघेणी स्पर्धा, प्रदूषण, महागाई, भ्रष्टाचार या सगळ्यांनी हैराण होणार आम्ही. तिकडे आमचं बस्तान बसलय. आव्हानं, स्पर्धा आहेत. पण इथल्यासारखे गैरप्रकार नाहीत. शिवाय इथली असुरक्षितता. सकाळी बाहेर गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल की नाही याची काय शाश्वती? सामाजिक विषमता तर पराकोटीची. या सगळ्यांना तोंड देता देता तोंडाला फेस येईल. म्हणून हा पर्याय.’’

नानानानींची ‘धरल चर चावतं’ आणि ‘सोडलं तर पळतं’ अशी परिस्थिती झाली. अनिताने समजूत घातली. तिचा कलही त्यांनी अमेरिकेला जाण्याकडे होता. नानानानी राजी झाले.

‘‘अनि, आम्ही तिकडे आलो तर या फ्लटचं काय करायचं? ठेवावा का? कधीतरी येऊ इकडे. नातेवाईक आहेत इथे.’’

‘‘नाना फ्लॅट ठेवून काय करायचंय? त्याची उत्सवारच होणार. प्रमिला मावशी, सरोज आत्या, दादासाहेब आहेतच…त्यांच्याकडे राहता येईल.’’ अचलाचा युक्तिवाद.

नानानानींना युक्तिवाद रूचला नाही. परंतु मुलाच्या कलानेच घ्यायचं म्हटल्यावर त्यांनी आपल्या विचारांना कलाटणी दिली.

‘‘नाना, फ्लॅट काढायचा असेल, तर आमच्या दादासाहेबांना विचारूया का? त्यांचा वन बी एच के कमी पडतोय.’’ अनिताचा प्रस्ताव.

‘‘जरूर जरूर. चांगला प्रस्ताव आहे हा. मी करेन फोन त्यांना.’’ नाना आनंदाने मनाले.

‘‘पण त्यांना परवडलं पाहिजे ना? दादासाहेब एकटे मिळवते. चार तोंड खाणारी, मुलांची शिक्षणं.’’ अक्याने मत मांडलं.

‘‘अचला, आम्ही आहोत ना! होईल काहीतरी व्यवस्था. पैशांची काळजी तुम्ही अजिबात करू नका.’’ अनिताचे समर्थन.

नानानानींनी कायमचे अमेरिकेला जायचे व फ्लॅट दादासाहेबांना सुपूर्द करायचा यावर शिक्कामोर्तब झाले. अनिताने आपल्या नवऱ्याशी व दादासाहेबांशी विचार विनिमय करून पैशांची व्यवस्था केली. नानानानींची मानसिक अवस्था काहीशी अस्थिर होती.

‘‘अनि बेटा, जाऊ या आपण. पण घाई नको करू. तुझी रजा किती दिवस आहे?’’

‘‘तसे एक महिन्यांपर्यंत आपण राहू शकतो. हो ना अच्चू?’’

‘‘माझं प्रमोशन ड्यू आहे. पण बघते काय जमतं ते.’’

‘‘इकडचे सर्व व्यवहार हाताळले पाहिजेत. बँका, पॉलिसीज, म्युचुअल फंड, शेअर्स, आमची पेंशन, सगळं व्हायला वेळ लागलेच,’’ नानांनी आपली अडचण बोलून दाखवली. ‘‘शिवाय दागिने आहेत लॉकरमध्ये. काही तर सासूबाईंच्या वेळचे आहेत. काय करायचे त्याचं अचला?’’ नानींचा प्रश्न.

‘‘ते दागिने तिकडे कुठे घालणार तुम्ही? अनिताकडे द्या.’’ नानांची सूचना.

‘‘तसं कशाला नानी? आपण ते दागिने घरी आणू. अनिताला हवे ते घेऊ दे. उरलेले आपण ठेवू. घालू या ना तिकडे महाराष्ट्र मंडळात समारंभाना जाताना किंवा पार्ट्यांना जाताना.’’ अचलाचा प्रस्ताव.

‘‘बरोबर घेणार म्हणजे कस्टमचा लोच्या.’’ अनिरूद्धची शंका.

‘‘अनि, मी असं छान पॅकिंग करतो ना, की काही प्रॉब्लमच येणार नाही.’’ नानांची ग्वाही.

‘‘चला. बेत तर अगदी उत्तम ठरला. मंडळी इस खुशी मे गोडाचा शिरा हो जाए. नो सॅकरीन.’’ नाना खुशीत म्हणाले.

‘‘वाटत बघत असतात खवय्येगिरीची,’’ नानींचा शेरा.

‘‘असू देत हो नानी. मी करते. अनितासुद्धा येणार आहे ना?’’

‘‘व्वा व्वा. ‘सोने पे सुहागा…’ चवीचं खाणार त्याला अचला देणार. ’’

खेळीमेळीच्या वातावरणात जाण्याची तयारी सुरू झाली. एका महिन्यांनंतरची तिकिटे काढली. दादासाहेबांशी फ्लॅटचा व्यवहार पूर्ण झाला.

‘‘आपण दादासाहेबांना फ्लॅट घरातल्या सामानासकट देऊ या.’’ नानींनी विचारलं.

‘‘हो. द्यावाच लागणार. त्या लहानशा घरातलं फर्निचर इथे चांगलं दिसणार आहे का? शिवाय खर्चसुद्धा परवडला पाहिजे ना?’’

‘‘तसं नाही अचला. आपण तरी या फर्निचरचं काय करणार आहोत?’’ नानींनी समजावलं.

नाना आर्थिक व्यवहार स्थिरस्थावर करण्याच्या मोहीमेवर रूजू झाले. द्विधा मनस्थितीत सर्व सोपस्कार केले जात होते. दागिने नानींच्या स्वाधिन केले.  ‘‘अचला, अनिता कोणी काय दागिने घ्यायचे ते ठरवा.’’ नानींनी विचारलं.

‘‘अनिता, तुला काय हवं ते ठेव. काही घाई नाहीए. तुझ्या दोन्ही सुनांची तरतूद करून ठेव.’’ अचला बोलली.

‘‘मला खास आवड नाहीए दागिन्यांची. आजीच्या हातचे आहेत ना, घेईन काही नग. अचला, आता तुम्हीसुद्धा तयारी करा. लहान बाळाचा आवाज ऐकायला कान आतूर झालेत.’’

‘‘तसं नाही गं अनिता. आता आम्हा दोघांचं प्रमोशन अपेक्षित आहे. नविन पोझिशेनवर सेटल होऊ दे ना!’’ अचलाने बाजू स्पष्ट करत म्हटलं.

‘आता तुला काळजी नको. नानानानी आहेत बेबी सिटिंगसाठी.’’ अनितानं म्हणणं पुढे रेटलं.

‘‘हो गं अचले. नाहीतरी दिवसभर आम्ही काय करणार? खरंच तुम्ही कराच विचार. मी बोलते अनिरूद्धशी.’’ नानींनी अनिताची री पुढे ओढली.

पॅकिंगसाठीचे दागिने नानांच्या स्वाधिन केले गेले.

‘‘नाना, तिकिटं पंधरा दिवसांनी हातात येतील. तुमची आणि नानीची औषधं आणायची असतील ना!’’

‘‘तरी बरं तब्येतीच्या फारशा तक्रारी नाही म्हणून. कृष्णा मेडिकलवाला सहा महिन्यांची औषधं पॅक करून पाठवणार आहे.’’

‘‘अनि, तुझ्या घरात देव्हारा, देव वगैरे आहेत का?’’

‘‘देव्हारा आहे. त्यात देवाच्या मूर्ती आहेत. आता दोनाची भर पडणार.’’

‘‘अगंबाई, कोणत्या मूर्ती घेतल्यास? दाखव तरी.’’

‘‘तुम्ही दोघं आमचे देवच आहात.’’

‘‘इतर मुलं म्हाताऱ्यांना टाळायला बघतात. आमचा मुलगा कवटाळतोय.’’

‘‘मंडळी, आमचे संस्कार तगडे आहेत.’’ असं बोलताना नानांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते.

जाण्याच्या तयारीबरोबर निरोप समारंभसुद्धा संपन्न होत होते. नानींचे महिला मंडळ, भिशी, नानांचा पेन्शनर कट्टा, हास्य क्लब सर्वांनी मोठ्या उत्साहात निरोप समारंभ साजरे केले. पेन्शनर कट्टयाचा समारंभ हॉल घेऊन दणक्यात साजरा झाला. कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटवस्तू दिल्या. नाना-नानींना प्रशंसापूर्वक भाषणे व कवितांचा नजराणाच पेश केला गेला. मन आनंदाने व पोट सुग्रास जेवणाने तृप्त झाले होते. परंतु दुधात मिठाचा खडा पडावा असे काहीसे झाले. दुसऱ्यादिवशी सकाळी.

‘‘आज हास्यक्लबला गेला नाहीत. दमणूक झाली काय. पण कार्यक्रम मात्र छान झालाय. तुम्हाला सोन्याची अंगठी आणि मला पैठणी दिली. आज सकाळी चहा घ्यायला बाहेर नाही आलात. मी एकटीच बोलतेय. काय झालंय तुम्हाला? एकटेच बसून राहायलात. बरं वाटत नाहीए का? सगळं सोडून जाणं अवघड वाटतंय का?’’

‘‘बंद करा तुमची चर्पट पंजरी. जरा शांत बसू दे मला,’’ नानांनी चढ्या आवाजात फर्मावलं. त्याचवेळी अनिरूद्ध आत आला.

‘‘नाना, काय झालं? बरं वाटत नाही का?’’ त्याने पाठीवर ठेवलेला हात नानांनी झटकून टाकला. नानी व अनिरूद्धा बुचकळ्यात पडले.

‘‘तुम्ही बाहेर जा बघू. मी येतो जरा वेळाने नाश्त्याला.’’

थोड्यावेळाने ते नाश्त्यासाठी येऊन बसले.

‘‘नाना, आज गरमागरम डोसे आणि चटणी आहे.’’ अचला बोलली.

‘‘हां, ठीक आहे,’’ एक डोसा खाऊन ते उठले. नानींना चिंता वाटली.

‘‘असं काय? आज एकच डोसा?’’

‘‘पोट भरलंय. मित्राला भेटायला जातोय. जेवायला येईन.’’

विचारमग्न अवस्थेत ते बाहेर पडले. ते परत येईपर्यंत नानी चिंतातुरच होत्या. सर्वांची जेवणं यंत्रवतच झाली.

‘‘अनिरूद्धा. तिकिटं मिळाली का?’’

‘‘उद्या किंवा परवा देतो म्हणाला.’’

‘‘तुम्हा दोघांचीच आण.’’

‘‘म्हणजे तुम्ही दोघं…’’

‘‘येणार नाही.’’

दोनशेचाळीस व्होल्टचा धक्का लागल्यासारखे नानी, अनिरूद्ध, अचला थरथरले.

‘‘अजूनपर्यंत कोणताही निर्णय माझ्या सल्ल्याशिवाय घेतला नाही. आता इतका महत्त्वाचा निर्णय…’’

‘‘घ्यावा लागला. आताच कारण विचारू नका. अनिरूद्धला जाऊ दे. मग सांगेन स्वत:हून सगळं.’’

ते दोघं जाण्याची नानी वाटच पाहत होत्या.

‘‘सांगा आता. तुमच्या या विक्षिप्त निर्णयाचं कारण. ये ग बबडे.’’

‘‘ऐका. पेन्शनर कट्ट्याच्या निरोप संमारंभाचं जेवण खूपच जड झालं होतं. मन आणि पोट दोन्ही तृप्त होती. त्यामुळे लगेच झोप लागली. परंतु काही वेळातच  पोटात अस्वस्थ वाटायला लागलं. तुमची ब्रम्हानंदी टाळी लागली होती. चूर्ण     शोधायला गेलो. कपाट अनिच्या खोलीच्या बाहेरच आहे. त्यामुळे संभाषण स्पष्ट ऐकू येत होतं.’’

‘‘अनि, नानानानी आपल्या घराच्या प्रेमातच पडलेत.’’

‘‘बरं झालं. म्हणजे सगळी कामं ते खुशी खुशी करतील.’’

‘‘गार्डनिंग करणाऱ्या रॉबर्टला आणि कुक मेरीला काढून टाकू या.’’

‘‘हो. आता बचत करायलाच पाहिजे. नवीन धंद्याला भांडवल हवं ना!’’

‘‘शिवाय दोघांचा खर्च वाढणार.’’

‘‘तसं त्यांचं सेव्हिंग आहे. फ्लॅटचे पैसेही आहेत.’’

‘‘दादासाहेबांच्या पैशांबाबत मी जरा साशंकच होते.’’

‘‘दोघांचं पेन्शन इकडेच बँकेत जमा होणार. तो सर्व पैसा तिकडे ट्रान्सफर करण्याची तजविज केली पाहिजे.’’

‘‘तो तुझ्याच नावावर ठेव. धंद्याबाबत काही बोलला नाहीयेस ना?’’

‘‘छे ग. उगाच मध्येच खोडा घालणार. सगळं होऊ दे व्यवस्थित. मग पाहू. दागिन्यांचं काय झालं?’’

‘‘काय होणार? अनिताने तीन-चार बारीक नग घेतले. उरलेले दागिने नाना पॅक करून देणारेत.’’

‘‘गुड. म्हणजे धंद्यासाठी लोन काढावं लागणार नाही. भारतवारी लई भारी. चला. झोपू या. खूप उशीर झालाय.’’

नानींच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली.

‘‘मंडळी, केवढ्या मोठ्या संकटातून वाचलो, आनंद माना.’’

‘‘आपल्याच लेकराने केलेली मानहानी. मनाला लागणार नाही का?’’

‘‘त्या हानीपासून वाचल्याचा मला आनंद आहे.’’

‘‘पण आता आपण राहायचं कुठे? हा फ्लॅट तर दादासाहेबांना…’’

‘‘दिला. पण आपण त्यांचा घेतला.’’

‘‘अगंबाई, हा व्यवहार इतक्या पटकन् एकट्यानेच केलात?’’

‘‘एकट्यानेच नाही काही. माझा मित्र होता ना बरोबर.’’

‘‘हा कोणता मित्र?’’

‘‘तुमची बबडी. सौ. अनिता देशपांडे.’’

‘‘ही कार्टी नेहमीच तुम्हाला धार्जिणी असते. म्हणजे त्या दिवशी सकाळी मित्राला भेटायला गेला होतात तो…’’

‘‘हाच मित्र.’’ नानी दिलखुलास हसल्या.

‘‘बबडे, हसली गं हसली नानी.’’

‘‘पण फसले ना!’’

‘‘फसलीस कुठे?’’

‘‘माझे दागिने गेले ना अमेरिकेला.’’

‘‘कोणी सांगितलं? कपाट उघडून बघ. समोरच आहे डबा इन टॅक्ट.’’

‘‘त्यादिवशी माझ्यासमोरच पॅक केलेला डबा अचलाला दिला.’’

‘‘करेक्ट. पॅक केलेला डबा दिला. पण त्यात प्लॉस्टिकचे तुकडे आवाज       करत होते. ती आयडियासुद्धा या कार्टीचीच बरं का!’’

‘‘चांगले छुपे रूस्तम निघालांत दोघे?’’

‘‘या आनंदा प्रित्यर्थ मी माझा मुक्काम एका आठवड्याने वाढवणार आहे आणि आता लगेच जाऊन समोरच्या रूस्तमजीकडून तुम्हा दोघांच्या आवडीचं बटरस्कॉच आईस्क्रिम आणणार आहे.’’

हास्यकल्लोळात अनिताने दोघांना मिठीत घेतले.

दिवाळी

कथा * आशा साबळे

‘‘हे बघ शालिनी, मी कितीदा तुला सांगितलं आहे की जर वर्षातून एकदा मी तुझ्याकडे पैशाची मागणी केली तर तू माझ्याशी भांडण करत जाऊ नको.’’

‘‘वर्षातून एकदा? तुम्ही तर एकदाच इतके जास्त हरता की मी वर्षभर ते फेडत राहते.’’

शालिनीचं उपहासात्मक बोलणं ऐकून राजीव थोडा संकोचत म्हणाला, ‘‘आता जाऊ दे, तुलाही माहीत आहे की माझा हाच एक वीक पॉइंट आहे आणि तुझाही हाच वीक पॉइंट आहे की अजूनही माझा हा वीक पॉइंट तू दूर करू शकली नाहीस.’’

राजीवचा तर्क ऐकून शालिनी हैराण झाली. राजीव निघून गेल्यावर शालिनी विचार करू लागली की तिच्या आयुष्याची सुरूवातच या वीक पॉइंटपासून सुरू झाली होती. एमएचे पहिले वर्षही ती पूर्ण करू शकली नव्हती की तिच्या वडिलांनी राजीवबरोबर तिचे लग्न ठरवले होते. राजीव शिकला सवरलेला व दिसायलाही स्मार्ट होता.

सर्वात महत्त्वाची बाब ही की त्याचे उत्पन्न महिना ४०,००० रुपये होते. शालिनीने तेव्हा विचार केला होता की आईवडिलांना सांगावं की मला एमए पूर्ण करू द्या. पण राजीवला पाहिल्यानंतर तिलाच असे वाटले होते की कदाचित असा वर नंतर मिळणार नाही. बस्स् तेव्हापासूनच बहुधा राजीवबद्दल तिच्या मनाने कच खाल्ली होती.

आज तिला असे वाटले की लग्नानंतरही ती राजीवच्या गोडी गुलाबीने बोलण्याला व हसण्याला अजूनही भूलत होती.

लग्नानंतर शालिनीची ती पहिली दिवाळी होती. सकाळीच राजीव जेव्हा तिला म्हणाला की १० हजार रूपये काढून आण, तेव्हाच शालिनीला आश्चर्य वाटले. कारण कधी १-२ हजारांपेक्षा जास्त न मागणाऱ्या राजीवने आज इतके पैसे का मगितले.

शालिनीने विचारले, ‘‘का?’’

‘‘आण गं,’’ राजीव हसून म्हणाला होता. ‘‘महत्त्वाचे काम आहे, संध्याकाळी सांगतो.’’

राजीवचं रहस्यपूर्ण हसणं पाहून शालिनीला वाटले होते की कदाचित तो तिच्यासाठी नवी साडी आणेल. शालिनी दिवसभर सुंदर कल्पनांमध्ये रमली होती. पण सायंकाळी ७-८ वाजले तरी राजीव घरी आला नाही तेव्हा विचारांनी मनात एकच कल्ला केला,  ‘‘काही दुर्घटना तर घडली नसेल, कोणीतरी राजीवच्या मोटारसायकलपुढे फटाके लावून त्याला जखमी तर केले नसेल.’’

८ वाजल्यानंतर तिने घराचा उंबरठा तसाच राहू नये म्हणून ४ दिवे लावले. पण तिचे मन मात्र भयानक कल्पनांमध्ये गुंतून राहिले. पूर्ण रात्र जागून गेली, पण राजीव आला नाही.

घाईगडबडीत सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा, उन्हं वर आली होती आणि तिने पाहिले की राजीव दुसऱ्या पलंगावर झोपला आहे. त्याच्याकडे गेली, पण लगेच मागे सरकली. राजीवच्या श्वासांना दारूचा वास येत होता. तितक्यात शालिनीला पैशांची आठवण झाली. तिने राजीवचे सर्व खिसे तपासले. पण ते रिकामे होते.

‘‘कोणी राजीवला दारू पाजून सर्व पैसे काढून तर नाही ना घेतले?’’ तिने विचार केला. पण न जाणो किती तरी वेळ ती तिथेच उभी राहून मनाती शंकांचं समाधान करून घेत राहिली. शेवटी जेव्हा तो उठेल, तेव्हा विचारते असे म्हणून ती आपल्या कामाला लागली.

दुपारनंतर जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा तिने चहा देताना विचारले, ‘‘कुठे होतात रात्रभर? भीतिने माझा जीव जायची वेळ आली. तुम्ही आहात की काही सांगतच नाही. तुम्ही दारू प्यायलाही सुरूवात केली? ते पैसे कुठे आहेत, जे तुम्ही खास कामासाठी घेतले होते?’’

शालिनीला वाटले की राजीव रागवेल, ओरडेल, संकोचेल, पण तो तिचा गैरसमज होता. शालिनीचे बोलणे ऐकून राजीव हसत म्हणाला, ‘‘हळू हळू, एक एक प्रश्न विचार, अगं. मी काही साडी खरेदीला गेलो नव्हतो.’’

‘‘काय?’’? शालिनी आश्चर्याने म्हणाली.

‘‘त्यात काय आश्चर्य वाटायचं? दरवर्षी आपण फक्त दिवाळीलाच तर भांडतो.’’

‘‘म्हणजे तुम्ही जुगार खेळून आलात? १० हजार रुपये तुम्ही जुगारात हरलात?’’ ती दु:खी होत म्हणाली.

राजीवने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, ‘‘अगं, वर्षभरात एकदाच तर पैसे खर्च करतो. तू तर वर्षभरात ५-६ हजारांच्या ४-५ साड्या खरेदी करतेस.’’

शालिनीला वाटले की थोडं समजून घेऊनसुद्धा ती राजीवला सुधारू शकेल. पण हा तिचा गैरसमज ठरला.

आधी १० हजार रुपयांवर संपणारी बाब आता २० हजार रुपयांवर पोहोचली. ती रक्कम चुकवता चुकवता पुढची दिवाळी आली होती.

मागच्यावेळी तर तिने लपवून मुलांसाठी १० हजार रुपये ठेवले होते. पण राजीव तेही घेऊन गेला होता. राजीव पैसे घेऊन जात असताना शालिनीने त्याला अडवले होते, ‘कमीत कमी मुलांसाठी तरी हे पैसे सोडा.’ पण राजीवने काही ऐकले नाही.

त्याचदिवशी शालिनीने ठरवले की पुढच्या दिवाळीपर्यंत हे प्रकरण निकालात काढायचे.

संध्याकाळी ५ वाजता राजीव परतला. त्याला रिकाम्या हाताने परतलेले पाहून मुले निराश झाली. पण काही बोलली नाहीत. शालिनीने त्यांना सांगितलं होते की त्यांना दिवे लावण्याआधी फटाके नक्की मिळतील. राजीवने आधी इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या, मग शालिनीला विचारले, ‘‘आपल्या आईकडून आलेले फटाके तर होतेच ना घरात?’’

शालिनी म्हणाली, ‘‘होते आता नाहीत?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘मी मोलकरणीच्या मुलाला दिले?’’

‘‘पण का?’’

‘‘तिच्या नवऱ्याने तिचे पैसे हिसकावून घेतले म्हणून?’’

राजीवने थोडा विचार केला. मग म्हणाला, ‘‘वळून वळून माझ्यावरच बोट ठेवले जात आहे तर…’’

‘‘हे पाहा, राजीव, मी कधीही मोठ्या आवाजात तुम्हाला विरोध केलेला नाही. तुम्हालाच माहीत आहे की तुमच्या या सवयी काय घात करू शकतात.’’

शालिनीचे बोलणे ऐकून राजीव चिडून म्हणाला, ‘‘ठिक आहे, ठिक आहे. मला सर्व ठाऊक आहे. एवढं दु:ख का करतेस? तुला कोणापुढे हात तर पसरावा लागत नाही ना?’’

शालिनी म्हणाली, ‘‘हीच तर भीती आहे. उद्या न जाणो मला आपल्या मोलकरणीसारखे कोणापुढे हात पसरायला लागू नये,’’ असे म्हणून शालिनीने बहुधा राजीवच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला. तो म्हणाला, ‘‘बडबड बंद कर? काय बोलते आहेस कळतंय तरी का??थोड्याशा पैशांसाठी इतकं वाईट बोलतेस.’’

‘‘थोडेसे पैसे? तुम्हाला कळतंय तरी का कि वर्षातून एकदा दारू पिऊन तुम्ही हजारो गमावून येता. तुम्हाला तर मुलांचा आनंद हिरावून घेताना काही वाईट वाटत नाही. नेहमी म्हणता की वर्षातून एकदाच तुमच्यासाठी दिवाळी असते. कधी विचार केला की माझ्या आणि मुलांसाठी ही दिवाळी वर्षातून एकदाच येते? कधी साजरी केली कुठली दिवाळी तुम्ही आमच्यासोबत?’’

शालिनीच्या तोंडून कधीही अशा गोष्टी न ऐकलेला राजीव आधी तर गप्पच उभा राहिला. मग संतापून म्हणाला, ‘‘जर तू मला पैसे न देण्यावर ठाम असशील तर मीही माझ्या मनाने वागणार आता.’’

आणि शालिनी राजीवला काही म्हणणार, त्या आधीच तो मोटारसायकल काढून निघून गेला.

शालिनी विचार करू लागली की या ११ वर्षातसुद्धा तिला हे कळू शकलं नाही की नेहमी गोडीगुलाबीने वागणारा राजीव असा एका दिवसात कसा बदलू शकतो.

‘‘दिवाळीच्या दिवशी मित्रांसमोर अपमानित होण्याच्या भीतिने तर राजीव जुगार खेळत नसेल ना. असे वाटतेय आता वेगळाच काही पर्याय पाहावा लागेल.’’ शालिनीने ठरवले.

तिकडे मोटारसायकल बाहेर काढताना राजीव विचार करत होता, ‘त्याने काय करावं? फटाके आणून दिले तर त्याचं नाव कापलं जाईल. शालिनी पैसेही देणार नाही. हे त्याला कळून चुकले. अचानक त्याला त्याचा मित्र अक्षयची आठवण आली. त्याच्याकडून पैसे उधार घ्यावेत.’ त्याने मोटार सायकल बाहेर आणली.

तितक्यात ‘‘कुठे निघाला आहात का?’’ हा आवाज ऐकून राजीवने वळून पाहिले.

त्याने पाहिले, समोर अक्षयची पत्नी रमा आणि तिची दोन्ही मुले येत होती.

‘‘वहिनी तुम्ही? आज कसे बाहेर पडलात?’’ त्याने मनातल्या मनातच म्हटले.

‘‘आधी आत तर बोलवा, मग सगळं सांगते.’’ अक्षयची पत्नी म्हणाली.

‘‘हो, हो, आत या ना. अगं इंदू, प्रमोद, बघा बरं कोण आलं आहे,’’ मोटारसायकल उभी करत राजीव म्हणाला.

इंदू, प्रमोद धावत धावत बाहेर आले. शालिनीसुद्धा आवाज ऐकून बाहेर आली.

‘‘रमा वहिनी, तुम्ही, दादा कुठे आहेत?’’

‘‘सांगते. आधी हे सांगा की एक दिवसासाठी तुम्ही माझ्या मुलांना आपल्या घरात ठेवू शकता का?’’

शालिनी लगेच म्हणाली, ‘‘हो, का नाही, पण काय झाले?’’

रमा उदास स्वरात म्हणाली, ‘‘झाले असे की तुमचे दादा हॉस्पिटलमध्ये आहेत. परवा त्यांचे अॅक्सिडेंट झाले होते. दोन्ही पायांना इतकी दुखापत झालीय की दोन महिन्यांपर्यंत उभे राहू शकत नाहीत. आणि पाहा ना, आज दिवाळी आहे.’’

राजीव घाबरून म्हणाला, ‘‘इतकी मोठी दुर्घटना घडली आणि तुम्ही आम्हाला सांगितलेसुद्धा नाही?’’

रमा म्हणाली, ‘‘तुम्हाला तर माहीतच असेल की माझे जाऊ आणि दिर येथे आले आहेत. आता रूग्णालयात पडल्या पडल्या हे म्हणतात की आधी माहीत असतं तर त्यांना बोलावलंच नसतं. म्हणतात की तुम्ही जा घरात आणि दिवे लावा, माझीच काय कुणाचीही इच्छा नाही.’’

राजीव आणि शालिनी दोघेही जेव्हा गप्प उभे राहिले, तेव्हा रमा म्हणाली, ‘‘आता मी आणि त्यांच्या भावाने म्हटले की आमची इच्छा नाही’’. तेव्हा म्हणू लागले, ‘‘मी काय मेलोय का जे घरात दिवे लावायचे नाही म्हणता? थोडेच तर लागले आहे. मुलांसाठी तरी तुम्हाला करावेच लागेल.’’

‘‘मी विचार करत होते की काय करू? मग मनात विचार आला आणि मुलांना मी इथे घेऊन आले. तुमची काही हरकत तर नाही ना?’’

इंदू रमाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. ती राजीवला म्हणाली, ‘‘पप्पा, तुम्ही राकेश आणि पिंकीसाठीही फटाके आणाल ना?’’

राजीव पटकन म्हणाला, ‘‘हो, हो, नक्की आणेन.’’ राजीव म्हणाला तर खरं, पण त्याला कळत नव्हतं काय करावं. तो याच गेंधळात होता इतक्यात शालिनी आतून पैसे घेऊन आली व त्याच्या हातात पैसे देत म्हणाली, ‘‘लवकर या.’’

तितक्यात इंदू म्हणाली, ‘‘पप्पा, तुम्हाला तुमच्या मित्राच्या घरी जायचं आहे ना?’’

‘मित्राच्या घरी,’ राजीवने आश्चर्याने इंदूकडे पाहिलं. ‘‘हो पप्पा, मम्मी म्हणत होती की तुमच्या एका मित्राचे हात आणि पाय नाहीत, म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला जाता.’’

त्याला कळत नव्हते की काय म्हणावं. त्याने शालिनीकडे पाहिले, तेव्हा शालिनी हसत होती.

मोटारसायकल चालवताना राजीवचे मन म्हणत होते की गुपचुप आपण आपल्या मित्रमंडळींकडे जावे. पण तितक्यात त्याला अक्षयचं बोलणं आठवलं. राजीव विचार करत होता की एक अक्षय आहे जो हॉस्पिटलमध्ये असूनही मुलांच्या आनंदाचा विचार करतो आणि एक मी आहे, जो मुलांना दिवाळी साजरी करण्यापासून थांबवतो आहे. शालिनी पण काय विचार करत असेल माझ्याबद्दल? तिने मुलांपासून वडिलांची चूक लपवण्यासाठी किती छान कथा रचली आहे.

मोटारसायकलचा हॉर्न ऐकून सर्व मुलं धावत बाहेर आली तेव्हा फटाके आणि मिठाई घेऊन राजीव उभा होता.

प्रमोद म्हणाला, ‘‘इंदू, इतके फटाके कोण वाजवणार?’’

‘‘हे आपण सर्वांनी आणि तुझ्या आईने उडवायचे आहेत,’’ असे राजीव म्हणाला तेव्हा दारात आलेली शालिनी उत्तरादाखल हसत होती.

शालिनीने गंमतीने विचारले, ‘‘पैसे देऊ, अजून रात्र आहे शिल्लक.’’

राजीव म्हणाला, ‘‘खरंच देशील?’’ तेव्हा शालिनी घाबरली. इतक्यात राजीव शालिनीला जवळ ओढत म्हणाला, ‘‘मला म्हणायचे होते की पैसे दिले असतेस तर एका चांगल्या बँकेत तुझ्या नावे खाते उघडले असते.’’

उपेक्षा

कथा * कुमुद भोरास्कर

आज प्रथमच अनुभाला जाणवलं की नेहमी मैत्रिणीमध्ये किंवा बहिणीप्रमाणे वागणाऱ्या तिच्या आईचं अन् अनिशा काकूचं वागणं काही तरी वेगळं वाटतंय. अनिशा काकू जरा टेन्शनमध्ये दिसत होती.

आईनं वारंवार तिला विचारलं, तेव्हा तिनं जरा बिचकतच सांगितलं, ‘‘माझा चुलतभाऊ सलील इथं टे्निंगसाठी येतो आहे. तशी त्याची राहण्याची व्यवस्था त्यांच्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली आहे, पण सुट्टीच्या दिवशी सणावाराला तो इथं येईल.’’

‘‘तर मग इतकी काळजीत का आहेस तू? नाही आला तर आपण त्याला गाडी पाठवून बोलावून घेऊ.’’ शीतलनं, अनुभाच्या आईने उत्साहात म्हटलं.

‘‘काळजीचीच बाब आहे शीतल वहिनी. माझ्या आईनं मला फोनवर समजावून सांगितलं आहे, तुझ्या घरात तुझ्या तरूण पुतण्या आहेत, त्यांच्या मैत्रीणी घरी येतील जातील. अशावेळी सलीलसारख्या तरूण मुलाचं तुझ्या घरी येणं बरोबर नाही…’’

‘‘पण मग त्याला ‘येऊ नको’ हे सांगणं बरोबर आहे का?’’

‘‘तेच तर मला समजत नाहीए…म्हणूनच मी काळजीत आहे. मी असं करते, सलीलला आल्या आल्याच सांगेन की निक्की अन् गोलूचा जसा तू मामा आहेस, तसाच अनुभा अजयाचाही मामा आहेस…म्हणजे अगदी प्रथमपासून तो या नात्यानं या तरूण मुलींकडे बघेल…’’ अनिशानं म्हटलं.

‘‘सांगून बघ. पण हल्लीची तरूण मुलं असं काही मानत नाहीत,’’ आता शीतलच्याही सुरात काळजी होती.

‘‘असं करूयात का? सलील येईल तेव्हा मी त्याला माझ्या खोलीतच घेऊन जाईन. म्हणजे घरात इतरत्र त्याचा वावर नकोच!’’ अनिशानं तोडगा काढला.

‘‘बघ बाई, तुला जसं योग्य वाटेल तसं कर, एवढंच बघ की सलीलचा अपमान होऊ नये अन् त्याला आपलं वागणं गैर वाटू नये…शिवाय काही वावगंही घडू नये.’’ शीतल अजूनही काळजीतच होती.

अनुभानं हे सर्व ऐकलं अन् ठरवलं की ती स्वत:च सलीलपासून दूर राहील. सलील आला की ती सरळ आपल्या खोलीत जाऊन बसेल म्हणजे काकूला अन् आईला उगीचच टेन्शन नको.

अमितकाकाच प्रथम सलीलला घरी घेऊन आला होता. सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. मग अनुभाशी ओळख करून देताना त्यानं म्हटलं, ‘‘अनु, हा तुझाही मामाच आहे हं. पण तुम्ही जवळपास एकाच वयाचे आहात, तेव्हा तुमच्यात मैत्री व्हायला हरकत नाही.’’

हे ऐकून पार हबकलेल्या आई व काकूकडे बघून अनुभानं त्यावेळी त्याला फक्त हॅलो म्हटलं अन् ती आपल्या खोलीत निघून गेली. पण तेवढ्या वेळात त्याचं देखणं रूप अन् मोहक हास्य तिच्या मनात ठसलं.

पुढे सलील एकटाच यायचा. त्याच्या मोटर सायकलचा आवाज आला की अनुभा खोलीत निघून जायची. पण तिचं सगळं लक्ष काकूच्या खोलीतून येणाऱ्या मजेदार गप्पांकडे अन् सतत येणाऱ्या हसण्याच्या आवाजाकडे असायचं.

सलीलजवळ विनोदी चुटक्यांचा प्रचंड संग्रह होता. सांगायची पद्धतही छान होती.

मोहननं ओळख करून देत म्हटलं, ‘‘हा माझा मित्र सलील आहे. अनु आणि सलील ही माझ्या बहिणीची, माधवीची खास मैत्रीण, अनुभा.’’

सलीलनं हसून म्हटलं, ‘‘मी ओळखतो हिला, मी मामा आहे हिचा.’’

‘‘खरंय? तर मग अनु, तू आता तुझ्या मामाला जरा सांभाळ. अगं आज प्रथमच तो माझ्या घरी आला आहे अन् मी फार कामात आहे. तेव्हा तूच त्याच्याकडे लक्ष दे. सर्वांशी त्याची ओळख करून दे. मला आई बोलावते आहे…मी जातो.’’ मोहन ‘‘आलो’’ म्हणत तिथून आत धावला.

सलीलनं खट्याळपणे हसत तिच्याकडे बघितलं अन् म्हणाला, ‘‘माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का प्लीज? मी दिसायला इतका कुरूप किंवा भितीदायक आहे का की माझी चाहूल लागताच तू तडक तुझ्या खोलीत निघून जातेस? मला किती त्रास होतो या गोष्टीचा?’’

अभावितपणे अनु बोलून गेली, ‘‘त्रास तर मलाही खूप होतो. लपावं लागतं म्हणून नाही तर तुला बघू शकत नाही, म्हणून.’’

‘‘तर मग बघत का नाहीस?’’

अनुभानं खरं कारण सांगितलं. आईचं व काकूचं टेंशन सांगितलं.

‘‘असं आहे का? खरं तर माझ्या घरीही हेच टेंशन होतं. मी इथं येतोय म्हणताना माझ्या आईला अन् काकुलाही हेच वाटत होतं…पण तुझ्या काकांनी तर आपल्यात मैत्री होऊ शकते असं सांगितलं. मग माझ्यासमोर येऊ नकोस हे कुणी सांगितलं?’’

‘‘तसं कुणीच सांगितलं नाही. पण काकांचं बोलणं ऐकून काकू आणि आई इतक्या हवालदिल झाल्यात की त्यांचं टेंशन वाढवण्यापेक्षा मी स्वत:ला तुझ्यापासून दूर ठेवणंच योग्य मानलं.’’

‘‘हं!’’ सलीलनं म्हटलं, ‘‘तर एकूण असं आहे म्हणायचं. तुझ्या घरून कुणी येणार आहेत का आज इथल्या कार्यक्रमाला?’’

‘‘आई, अनूकाकू येणार आहेत ना?’’

‘‘तर त्या यायच्या आत तू आपल्या सर्व मैत्रीणींशी माझा मामा म्हणूनच ओळख करून दे. त्यामुळे माझ्या ताईला म्हणजे तुझ्या काकूलाही जाणवेल की मी नाती मानतो.’’

माधवी अन् इतर मुलींनाही हा तरूण, सुंदर अन् हसरा, हसवणारा मामा खूपच आवडला. शीतल अन् अनिशा जेव्हा कार्यक्रमात पोहोचल्या, तेव्हा सलील धावून धावून खूप कामं करत होता अन् लहान मोठे सगळेच त्याला मामा म्हणून बोलावत होते.

‘‘हे सगळं काय चाललंय?’’ अनिशाने विचारलं.

‘‘बहिण्याच्या शहरात येण्याचा प्रसाद आहे हा.’’ सलील चेहरा पाडून म्हणाला.

‘‘मला वाटलं होतं या शहरात चांगल्या पोरी भेटतील, गर्लफ्रेंड मिळेल पण अनुभाच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या भाच्याच झाल्यात. राहिली साहिली ती माधवी, माझ्या मित्राची बहिण, तीही मला मामाच म्हणतेय. आता भाचीला गर्लफ्रेंड कसं म्हणायचं? म्हणून काम करतोय, मामा झालोय अन् आशिर्वाद गोळा करतोय.’’

शीतल तर हे ऐकून एकदम गदगदली. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यावर आमंत्रित पाहुण्यांची जेवणं झाली. शीतलनं अनुभाला घरी चालण्याबद्दल विचारलं, तेव्हा माधवी म्हणाली, ‘‘अजून आमची जेवणं नाही झालेली. आम्ही सर्व व्यवस्था बघत होतो…एवढ्यात नाही मी जाऊ देणार अनुभाला.’’

‘‘एकटी कशी येणार?’’

माधवीची आई म्हणाली, ‘‘एकटी कशानं? मामा आहे ना? तो सोडेल.’’

शीतलनं विचारलं, ‘‘सलील, अनुभाला घरी सोडशील.’’

‘‘सोडेन ना ताई, पण आमची जेवणं आटोपल्यावर. यांचा नाचगाण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे बराच उशीर होईल.’’

‘‘तुम्ही हवं तेवढा वेळ थांबा. मग भाचीचा कान धरून तिला घरी आणून सोड. मामा आहेस तू तिचा.’’ हसत हसत शीतलनं म्हटलं.

शीतलनं असा हिरवा कंदिल दाखवल्यावरदेखील अनुभा सलील यायचा, तेव्हा आपल्या खोलीतच दार लावून बसायची. त्याच्याबद्दल कधी काही ती विचारत नसे की बोलत नसे. पण सलीलला ज्या दिवशी सुट्टी असायची, त्यादिवशी ती मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते असे सांगून बाहेरच्या बाहेर सलीलला भेटायची. माधवीलाही कधी संशय आला नाही. कॉलेजच्या परीक्षा संपता संपता घरात अनुभाच्या लग्नाची चर्चा झाली.

तिनं सलीलला सांगितलं.

सलील म्हणाला, ‘‘मलाही तुझ्या आई आणि काकूनं तुझ्यासाठी मुलगा बघायला सांगितलं आहे.’’

‘‘मग तू स्वत:चंच नाव सुचव ना?’’

‘‘वेडी आहेस का? मी इथं येण्यापूर्वी इतकं टेंशन दोन्ही घरांमध्ये होतं ते एवढ्यासाठीच की मी तुझ्या प्रेमात पडून लग्न करण्याचा हट्ट धरला तर केवढा अनर्थ होईल. ज्या घरात मुलगी दिली, त्या घरातली मुलगी करत नाहीत.’’

‘‘तू हे सर्व मानतोस?’’

‘‘मी मुळीच मानत नाही. पण आपल्या कुटुंबातल्या मान्यता अन् परंपरा मी मानतो. त्यांचा आदर करतो.’’

‘‘तुला माझ्या या प्रेमाची किंमत नाहीए?’’

‘‘आहे ना? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही करू शकत नाही मी.’’

‘‘तू पुरूष आहेस, तेव्हा लग्न न करण्याचा तुझा हट्ट किंवा जिद्द तुझे घरातले लोक चालवून घेतील. मला मात्र लग्न करावंच लागेल…’’

‘‘लग्न तर मी ही करेनच ना अनु?’’

अनुभा वैतागली. काय माणूस आहे हा? माझ्या खेरीज दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही असह्य होतेय याला अन् तरीही हा लग्न करणारच? तिनं संतापून त्याच्याकडे बघितलं.

तिच्या मनातले भाव जाणून सलील म्हणाला, ‘‘लग्न कुणाबरोबर का होईना, पण माझ्या अन् तुझ्या मनात आपणच दोघं असू ना? आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवताना आपण हाच विचार सतत मनात ठेवायचा की तू अन् मी एकत्र आहोत…एकमेकांचे आहोत…’’

अनुभानं स्वत:च्या मनाची समजूत काढली की आता जशी ती सलीलच्या आठवणीत जगते आहे, तशीच लग्न झावरही जगेल. उलट जेव्हा लग्नानंतर भेटण्याचा प्रसंग येईल, तेव्हा भेटी अधिक सहज सुलभ होतील. कारण विवाहितांकडे संशयानं बघितलं जात नाही.

तिनं हे जेव्हा सलीलला सांगितलं, तेव्हा तो एकदम उत्साहानं म्हणाला, ‘‘व्वा! हे तर फारच छान! मग तर चोरून कशाला? उघड उघड, राजरोस सगळ्यांच्या समोर गळाभेट घेईन, कुठं तरी फिरायला जाण्याच्या निमित्तानं हॉटेलात जेवायला नेईन.’’

लवकरच दुबईला स्थायिक झालेल्या डॉ. गिरीशबरोबर अनुभाचं लग्न ठरलं. दिसायला तो सलीलपेक्षाही देखणा होता. भरपूर कमवत होता. स्वभावानं आनंदी, प्रेमळ अन् अतिशय सज्जन होता. पण अनुभा मात्र त्यांच्यात सलीललाच बघत होती. लग्नाला अनिशाकाकूच्या माहेरची खूप मंडळी आली होती. संधी मिळताच एकांतात अनुभानं सलीलला भेटून म्हटलं, ‘‘आपल्या प्रेमाची खूण म्हणून, आठवण म्हणून मला काहीतरी भेटवस्तू दे ना.’’

‘‘अगं, देणार होतो, पण अनिशाताईनं म्हटलं, ‘‘घरून आईनं भक्कम आहेर पाठवला आहे, तू वेगळ्यानं काहीच द्यायची गरज नाही.’’

अनुभाला खरं तर राग आला. अरे आईनं काही आहेर पाठवणं अन् तू भेटवस्तू देणं यात काही फरक आहे की नाही? आईनं आहेर केला, तरी ती अजीजीनं म्हणाली, ‘‘तरीही, काही तरी दे ना. ज्यामुळे तू सतत जवळ असल्याची भावना मनात राहील.’’

सलीलनं खिशातून रूमाल काढला. त्याचं चुबंन घेतलं अन् तो अनुभाला दिला. अनुभानं तो डोळ्यांना लावला अन् म्हणाली, ‘‘माद्ब्रया आयुष्यातली ही सर्वात मौल्यवान वस्तू असेल.’’

सुरूवातीपासूनच अनुभा गिरीशला सलील समजून वागत होती. त्यामुळे तिला काहीच त्रास झाला नाही. उलट त्यांचं नातं खूपच खेळीमेळीचं अन् प्रेमाचं झालं. ती गिरीशबरोबर सुखी होती. तिनं ठरवलं होतं की सलील भेटला की त्याला सांगायचं, ‘‘फॉम्युला सक्सेसफुल!’’ पण सांगायची संधीच मिळाली नाही. नैनीतालला हनीमून साजरा करून ती माहेरी आली तेव्हा गोलूला सलीलची मोटरसायकल चालवताना बघून तिनं विचारलं, ‘‘सलीलमामाची मोटरसायकल तुझ्याकडे कशी?’’

‘‘सलीलमामाकडून पप्पांनी विकत घेतलीय, माझ्यासाठी.’’

‘‘पण त्यानं विकली कशाला?’’

‘‘कारण तो कॅनडाला गेलाय.’’

अनुभा एकदम चमकलीच! ‘‘अचानक कसा गेला कॅनडाला?’’

‘‘ते मला काय ठाऊक?’’

कसंबसं अनुभानं स्वत:ला सावरलं. सायंकाळी ती माधवीकडे भेटायला गेली. तिला खरं तर मोहनकडून सलीलबद्दल जाणून घ्यायचं होतं.

तिनं मोहनला विचारलं, ‘‘माझ्या लग्नात आला होता तेव्हा सलीलमामा काहीच बोलला नव्हता. एकाएकी कसा काय कॅनडाला निघून गेला?’’

‘‘पहिल्यांदा जाताना कुणीच एकाएकी परदेशात जात नाही अनु, सलील इथं त्याच्या कंपनीच्या हेडऑफिसमध्ये कॅनडाला जाण्याआधी खास टे्निंग घ्यायलाच आला होता. टे्निंग संपलं आणि तो कॅनडाला गेला. सगळं ठरलेलं होतं.’’ मोहन म्हणाला.

‘‘तुझ्याकडे त्याचा फोननंबर असला तर मला दे ना.’’ अनुनं म्हटलं.

‘‘नाही गं, अजून तरी त्याचा मला फोन आलेला नाही…’’

खट्टू होऊन ती घरी परतली. दोनच दिवसात तिला दुबईला जायचं होतं. नव्या आयुष्यात ती सुखात होती. पण कायम सलीलच्याच आठवणीत राहून, त्यानं दिलेल्या रूमालाचे पुन्हा पुन्हा मुके घेत.

एकदा गिरीशनं तिच्या हातात तो रूमाल बघितला अन् तो म्हणाला, ‘‘इतका घाणेरडा रूमाल तुझ्या हातात शोभत नाही. एका डॉक्टरची बायको आहेत तू. फेक तो रूमाल. डझनभर नवे रूमाल मागवून घे.’’ गिरीश सहजपणे बोलला पण अनुभा दचकली, भांबावली.

रूमाल फेकणं तर दूर ती त्या रूमालाला धुवतही नव्हती. कारण सलीलनं त्या रूमालाचं चुंबन घेतलं होतं. तिनं तो रूमाल टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून लपवून ठेवला, निदान गिरीशच्या नजरेला पडायला नको.

गिरीशचं कुटुंब अनेक वर्षांपासून दुबईत स्थायिक झालं होतं. जुमेरा बीचजवळ त्यांचा मोठा बंगला होता. शहरात क्लिनिक्स अन् त्यांच्याच जोडीला मेडिकल शॉप्स होती. एक क्लिनिक गिरीश बघत असे. कुटुंबातल्या सगळ्याच स्त्रिया घरच्या धंद्यात काही तरी मदत करत होत्या.

अनुभाही थोरली जाऊ वर्षाच्यासोबत काम करू लागली. इथल्या आयुष्यात ती आनंदी होती, पण तिला हल्ली सलीलची आठवण फारच बेचैन करत होती. वांरवार त्या रूमालाचे मुके घ्यावे लागत होते.

एक दिवस वर्षाच्या चुलत बहिणीचा फोन आला. तिनं सांगितलं की तिच्या नवऱ्याचंही दुबईला पोस्टिंग झालंय. अजून ऑफिसनं गाडी आणि घर दिलं नाहीए. पण त्यांच्या राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलात केली आहे. गाडी मिळाली की भेटायला येईल. पण वर्षाला तर तिला भेटायची घाई झाली होती. अनुभानं सुचवलं की ऑफिसातून येताना त्या दोघी गाडीनं लताच्या हॉटेलात जातील, तिथून तिला आपल्या घरी आणायचं. तिच्या नवऱ्याचं ऑफिस सुटेल  तेव्हा आपला ड्रायव्हर त्याला ऑफिसमधून पिकअप करून घरी येईल. रात्रीचं जेवण सगळे एकत्रच घेतील, मग ड्रायव्हर त्या दोघांना पुन्हा त्यांच्या हॉटेलवर सोडेल. वर्षाला ही सूचना आवडली. दिवस ठरवून लताला फोन केला. तिनं अन् तिच्या नवऱ्यानं होकार दिला.

लताला वर्षानं विचारलं, ‘‘तू तर लग्नानंतर अमेरिकेला की कुठंतरी गेली होतीस, मग दुबईला कशी आलीस?’’

‘‘मला तिथली थंडी, तिथला बर्फ आवडत नव्हता म्हणून यांनी इथं बदली करून घेतली.’’ लतानं तोऱ्यात उत्तर दिलं.

‘‘अरे व्वा! खूपच दिलदार दिसतोए तुझा नवरा. बायकोसाठी डॉलर कमावायचे सोडून दिराम कमवायला लागला. ऐट आहे बुवा!’’ वर्षानं विचारलं.

‘‘माझ्यासाठी तर ते स्वत:चा जीवही देतील ताई.’’ लताच्या बोलण्यात दर्प होता.

वर्षा अन् अनुभाला हसायला आलं.

‘‘आणि या अशा जीव देणाऱ्या मुलाशी तुझं लग्न ठरवलं कुणी? गोदाकाकींनी?’’ वर्षांनी विचारलं.

लता हसायला लागली, ‘‘नाही ताई, गोदाकाकी तर या सोयरिकीच्या विरोधातच होत्या. त्यांचं म्हणणं होतं की मुलगा जरा भ्रमरवृत्तीचा आहे, खूप मुलींशी त्याची प्रेमप्रकरणं झालीत. असा मुलगा आपल्याला नकोच,’’ पण काका म्हणाले, ‘‘लग्नाआधी मुलं अशीच टाइमपास असतात. लग्नानंतर ती व्यवस्थित वागायला लागतात.’’

‘‘तुमचे ‘ते’ तुम्हाला त्यांच्या आधीच्या प्रेमिकेच्या नावानं नाही का बोलावत? काही खास नाव घेऊन बोलालतात?’’ अनुभानं विचारलं.

‘‘नाही बाई, ते मला लताच म्हणतात.’’

‘‘याचा अर्थ तुमचे ‘ते’ फक्त तुमचेच आहेत.’’

सायंकाळी गिरीशला क्लिनिकमध्ये फारसं काम नव्हतं. असिस्टंट डॉक्टरला   सूचना देऊन तो लवकर घरी परतला. वर्षानं म्हटलं, ‘‘गिरीश, मी लताला जुमेरा बीचवर फिरवून आणते. अनुभा बाकीची व्यवस्था बघतेय. लताचे मिस्टर आले की तुम्ही त्यांना रिसीव्ह करा. आम्ही थोड्या वेळात घरी येतोच आहोत.’’ त्या दोघी निघून गेल्या.

काही वेळातच गिरीशचा उल्हसित आवाज कानी आला, ‘‘अगं अनु, बघ लताचे मिस्टर आलेत. ते कोण आहेत माहीत आहे का? तुझे सलील मामा.’’

ते ऐकताच अनुभाचा उत्साह, उल्हास फसफसून आला. धावतच ती ड्रॉइंगरूममध्ये आली. खरंच, सलीलच होता. अंगानं थोडा भरला होता.

‘‘घ्या, तुमची भाची आली…’’ गिरीशनं म्हटलं.

सलीलनं अनुभाकडे दुर्लक्ष करत म्हटलं, ‘‘पण माझी बायको कुठाय?’’

‘‘ती तिच्या बहिणीबरोबर बीचवर गेली आहे. येईलच, तोवर तुमच्या भाचीशी गप्पा मारा.’’

‘‘गप्पा तर मारूच, मामा आधी गळाभेट तरी घे.’’ अनुभानं त्याच्याजवळ जात म्हटलं.

‘‘लहान बाळासारखी मामाच्या मांडीवर बसू नकोस हं!’’ गिरीश गमतीनं म्हणाला.

‘‘माझ्या बायकोला मांडीवर बसवून तिच्या डोळ्यात मला बघायचाय समुद्र.’’ सलील उतावळेपणानं म्हणाला, ‘‘गिरीश, आपण समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ. तुम्ही वर्षावहिनींना घरी घेऊन या. मी अन् लता थोडावेळ समुद्र किनाऱ्याजवळ एकांतात घालवू, चला ना गिरीश…लवकर…प्लीज’’

इतकी उपेक्षा, इतका अपमान! अनुभाला ते सहन होईना…संतापानं ती आपल्या खोलीकडे धावली. एकट्यानं रडावं म्हणून नाही तर सलीलनं दिलेल्या रूमालाच्या चिंध्या चिंध्या करून फेकण्यासाठी…तो तिच्यासाठी अनमोल, अमूल्य असणारा रूमाल आता तिला ओकारी आणत होत, नकोसा झाला होता.

बहुरुपी

कथा * रीता कोल्हटकर

एका आर्ट गॅलरीत माझी आणि हर्षची पहिली भेट झाली होती. पाच मिनिटाच्या त्या ओझरत्या भेटीत बिझनेस कार्ड, व्हिजिटिंग कार्डची देवाण घेवाण झाली होती.

‘‘माझी स्वत:ची वेबसाइट आहे. त्यावर मी माझ्या सर्व पेंटिग्जचे फोटो टाकले आहेत. त्यांच्या किमती सकट.’’ बिझनेस कार्डच्या वेबसाइटच्या लिंकवर बोट ठेवत मी म्हटलं.

‘‘अरे व्वा! मी नक्की तुमची सर्व पेंटिग्ज बघतो. त्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवून फिडबॅकसुद्धा देतो. आर्ट गॅलरीत तर मी इतकी वर्षं जातोय, पण तुमच्यासारखी कलाकार मात्र कधी भेटलीच नाही. युवर एव्हरी पेंटिंग्ज इज सेईंग थाउजंड वर्ड्स,’’ माझ्या पेंटिग्जकडे निरखून बघत हर्ष म्हणाला.

‘‘हर्ष, तुम्हाला भेटून खरंच खूप हर्ष झालाय मला. स्टे इन टच.’’ मी त्यावेळी खूपच उत्साहित होऊन म्हटलं होतं. त्या छोट्याशा भेटीत मला तो ‘कलेचा पुजारी’ वाटला होता. अद्वितीय वाटला होता.

प्रत्यक्षात आमची भेट पाचच मिनिटं झाली होती, पण त्या आधी अर्धा तास मी दुरून त्याच्यावर लक्ष ठेवून होते. तो प्रत्येक पेंटिंगपाशी थांबून निरीक्षण करत होता. त्याच्या जवळच्या छोट्याशा डायरीत काही नोंदी करत होता.

‘‘नक्कीच हा कुणी तरी कलेतला दर्दी दिसतोय. कलेची पारख आहे याला.’’ माझ्या मनानं कौल दिला.

हर्षची भेट होऊन सहा महिने उलटले होते. या काळात त्यानं किंवा मी, एकमेकांना कधीच फोन वगैरेही केला नाही. माझ्या वेबसाइटवरून माझ्या पेंटिग्जची विक्री होत नव्हती. मी पेंटिग्ज विकली जावीत म्हणून खूप प्रयत्न करत होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या वेबसाइटची लिंक पोहोचावी असा माझा प्रयत्न होता. लोक मला ओळखतात, कमी ओळखतत किंवा जास्त ओळखतात हा मुद्दाच नव्हता. पण मला कलेचा क्षेत्रात नाव अन् पैसा मिळवायचाच आहे हा ध्यास होता. तेच माझं ध्येय, तेच माझं लक्ष होतं. शेवटी एक दिवस मी हर्षला एक मेसेज पाठवलाच.

त्यानं लगेच रिस्पॉन्सही दिला. ‘‘आज माझ्याबरोबर कॉफी घ्यायला आवडेल का?’’

मी चकितच झाले. पाच मिनिटांच्या भेटीनंतर सहा महिने अगदी अलिप्त असलेला हा माणूस मी एक मेसेज काय टाकला तर सरळ एकत्र कॉफी घेऊयात म्हणतोय?

‘‘विचित्रच दिसतोय,’’ मी जरा रागातच मनातल्या मनात म्हटलं अन् त्याच्या विचारण्यावर काही उत्तरही दिलं नाही. चार दिवसांनी माझ्या पेंटिग्जचं प्रदर्शन भरणार होतं, मी त्या कामांत गुंतले अन् नंतर हर्षला पार विसरले, आपल्या प्रयत्नांच्या बळावर आपली कला आणि आपल्यातला कलाकार सिद्ध करण्यावर मी भर दिला होता. काही दिवस मधे गेले अन् त्याचा फोन आला. ‘‘एक कप कॉफी घ्यायला माझ्याबरोबर, वेळ आहे का?’’

‘‘तू मला ओळखत नाहीस, मी तुला ओळखत नाही, अशावेळी ही कॉफी एकत्र घेण्याची बळजबरी का? एक मेसेज तुला टाकला याचा अर्थ मी रिकामटेकडी आहे अन् तुझ्याबरोबर टाइमपास करू शकते असा गैरसमज करून घेऊ नकोस,’’ मी स्पष्टच सांगितलं.

‘‘मी तुझी कला, त्यातली खोली आणि गांभीर्य समजून घेतलंय. त्या प्रवासातच मला तू ही समजली आहेस. जग जेवढा मान एम एफ हुसेनला देतंय तेवढाच मान मी तुला देतो आहे. पहिल्यांदाच जेव्हा तुझं नाव मी माझ्या मोबाइलमध्ये सेव्ह केलं तेव्हा त्यापुढे पेंटर सफिक्स असं लिहिलंय. तू स्वत: विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस. पण एक दिवस कलेच्या क्षेत्रात तू एम एफ हुसेनच्याही पुढे जाशील…राहता राहिली बाब एकमेकांना ओळखण्याची तर ती ओळख वाढवली तरच वाढेल ना?’’

स्वत:चं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही? हर्षच्या शब्दांनी मी ही सुखावले. त्याच्याकडून स्वत:ची प्रशंसा ऐकायला मला आवडू लागलं. त्या नादात मी तासन् तास फोनवर त्याच्याशी बोलू लागले. प्रत्येकवेळी तो माझा, माझ्या पेंटिग्जची, माझ्या कलेची इतकी प्रशंसा करायचा की माझ्या स्वप्नांना पंख फुटू लागले. मनांतल्या मातीत पडून असलेल्या पैसा, मान्यता, लोकप्रियतेच्या बियांना कोंब फुटू लागले.

‘‘मी किती मानतो हे तुला कळायचं नाही. हिंदुस्थानातल्या सव्वा कोटी लोकांनी मिळून जेवढं कुणाचं कौतुक केलं असतं, तेवढं मी एकटा करतोय तुझं कौतुक. महिने उलटले तुला एक कप कॉफी घ्यायला ये म्हणतोय, एवढं बोलल्यावर तर एखादा दगडही विरघळला असता.’’ एक दिवस हर्षचा फोन आला.

मी अर्थात्च दगड नव्हते. मी विरघळले यात नवल ते काय? पहिल्या भेटीनंतर आम्ही वरचेवर अन् पुन्हापुन्हा भेटू लागलो. ओळखीचं रूपांतर दाट मैत्रीत झालं होतं. अशाच एका भेटीत त्यानं सांगितलं की त्याचं लग्न झालेलं आहे. एक मुलगी आहे तीन वर्षांची. बायकोचं नाव मीनाक्षी, ती युनिव्हर्सिटीत संस्कृतची लेक्चरर आहे. तो स्वत: काहीच काम करत नाही.

‘‘मला काही करायची गरजच काय? माझ्या एम.एल.ए. बापानं रग्गड कमवून ठेवलंय. पुढल्यावेळी मलाही एम.एल.ए.चे तिकिट मिळतंय. चार दोनशे रुपयांच्या नोकरीत काही अर्थच नाही.’’ अत्यंत दर्पानं हर्ष बोलला.

मुळात तरुण मुलाचं काहीही न करणं अन् एवढा दर्प मला सहन न होणाऱ्यापलीकडलं. पण मला त्याक्षणी ते फारसं खटकलं नाही…मी बहुधा त्याच्या प्रेमात होते. तरीही मी विचारलंच.

‘‘नोकरी करण्यात अर्थ नाही तर मीनाक्षीसारखी नोकरी करणारी बायको कशी काय केलीस?’’

‘‘मूर्ख आहे ती. आपलच म्हणणं रेटत असते. लग्नापूर्वी तिनं अन् तिच्या घरच्यांनी कबूल केलं होतं की ती नोकरी सोडेल…पण लग्नानंतर ती बदलली. हटून बसली. नोकरी सोडणार नाही म्हणून. करतेय काकूबाई

नोकरी…एमएलएच्या कुटुंबात कसं राहायचं हे तिला अजूनदेखील कळलेलं नाही.’’ हर्षच्या चेहऱ्यावर दर्प अन् बोलण्यात सामान्य व्यक्तींबद्दलचा तिरस्कार ओसंडून जात होता.

त्याचं बोलणं ऐकून मी हतप्रभ झाले. माझं अंतर्मन मला सावध करत होतं की मी एका वाईट माणसासोबत आहे. हा माणूस चांगला, सभ्य, सज्जन नाही. तरीही माझ्या नकळत मी त्याच्यासोबत वाहवत जात होते. तो माझं कौतुक करत होता, सतत माझी प्रशंसा करत होता. आपल्या एम.एल.ए. वडिलांच्या नावाचा वापर करून मला खूप मोठ्या प्रदर्शनात पेंटिग्ज लावण्याचं प्रॉमिस करत होता. मलाही वेडीला ते सर्व खरं वाटत होतं. त्याचे एम.एल.ए. वडील मला माझं ध्येय गाठायला मदत करतील अशी वेडी आशा मी बाळगून होते. माझ्या मनातल्या प्रसिद्धी, पैसा मिळवण्याच्या दिव्याला त्यामुळे तेल मिळत होतं. त्या मिणमिणणाऱ्या उजेडात हर्षच्या खोटेपणाचा काळोख मला धडसा दिसतच नव्हता.

‘‘तू माझ्यासाठी मंदिरातल्या मूर्तीसारखी आहेस. मी काय म्हणतो तेवढं फक्त ऐकत जा. त्याहून जास्त माझ्या प्रेमात पडू नकोस. कारण मी विवाहित आहे. अन् एकदा तुला तुझ्या यशाच्या शिखरावर पोहोचवलं की तुझा माझा संबंध संपला.’’ त्यानं स्पष्टच सांगितलं.

‘‘तू विवाहित आहेस हे मला ठाऊक आहे. मलाही तू माझ्याशी लग्न करावं ही अपेक्षा नाहीए. पण मला एक कळत नाहीए की जर या वाटेवर आपण पुढे जाणार नाही आहोत तर आपण विनाकारणच का भेटतो आहोत?’’

‘‘पूजा करतो मी तुझी. तुला यशाच्या शिखरावर पोहोचलेलं बघायचंय मला. मला तुझ्याकडून काहीही नकोय. पण मी तुझा मित्र आहे. तुला प्रोत्साहन देतोय. पुढल्या वर्षी थायलंडला होणाऱ्या पेंटिग्जच्या प्रदर्शनात तुला ललित कला अकादमीची स्कॉलरशिप मिळवून देणार आहे. माझ्या वडिलांचे मोठमोठ्या लोकांशी कॉण्टेक्ट आहेत. त्यामुळे मलाच हे शक्य आहे. तुझी दोन तीन इंटरनॅशनल एक्द्ब्रिबिशन्स झाली की तुला प्रसिद्धी मिळायला वेळ लागणार नाही.’’

हे असं ऐकलं की माझं मन भरून यायचं. खूप छान वाटायचं. वाटायचं की मी प्रसिद्ध होईन, न होईन पण माझं एवढं कौतुक करणारा प्रशंसक आहे हे भाग्य तरी कमी आहे का? करतोय बिच्चारा माझ्यासाठी प्रयत्न. आता आम्ही रोजच भेटत होतो. पण हर्षची वृत्ती हल्ली बदलली होती. हल्ली तो अंगचटीला येऊ बघायचा. पूजा, मंदिरातली मूर्ती वगैरे न बोलता हल्ली त्याच्या डोळ्यात काही वेगळंच दिसत होतं.

‘‘एक मागू का तुझ्याकडे?’’

‘‘काय?’’

‘‘मी तुला मिठीत घेऊ शकतो?’’

‘‘अजिबात नाही…’’

‘‘फक्त एकदाच! प्लीज…मला काय वाटतं ठाऊक आहे?’’

‘‘काय?’’

‘‘मला असं वाटतं की मी तुला मिठीत घ्यावं अन् काळ तिथंच थांबावा…तुला वेडीला खरंच कल्पना नाहीए की मी तुला किती मानतो…किती किंमत आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल. एवढा मान कोणताही पुरूष कुठल्याही स्त्रीला देणार नाही…’’

अन् मी सरळ त्याच्या बाहुपाशात शिरले. ‘‘पूजा करतो तुझी. तुला उंच आकाशात विहरताना बघायचं मला.’’ माझ्या केसांतून बोटं फिरवत तो पुन्हा:पुन्हा तेच बोलत होता.

‘‘हर्ष, प्लीज, मला घरी जाऊ देत. उद्यापर्यंत एकदोन पेंटिग्ज पूर्ण करायची आहेत.’’

‘‘ठिक आहे. लवकरच भेटतो. या आठवड्यात संधी मिळताच वडिलांशी बोलून तुला ललित कला अकाडमीची स्कॉलरशिप मिळवून देतो.’’

काही दिवसानंतर आम्ही दोघं आमच्या नेहमीच्या रेस्ट्रॉरंन्टमध्ये समोरासमोर बसलो होतो. डिनर संपेपर्यंत रात्र झाली होती. गेले काही दिवस सतत पाऊस होता. आज दिवसभर सोनेरी उन्हानं दिवस प्रसन्न वाटला होता. हर्षनं जवळच्याच बागेत फिरून थोडे पाय मोकळे करण्याबद्दल सुचवलं. हवा खरोखर फार छान होती. मीही आढेवेढे न घेता होकार दिला.

‘‘जरा तिकडे बघ, काय चाललंय तिथं?’’ पार्कातल्या एका कोपऱ्यात झाडात दडलेल्या कबुतरांच्या जोडीकडे बोट दाखवत म्हटलं.

‘‘कुठ काय आहे? काहीच नाही…’’ मी मुद्दाम तिकडे दुर्लक्ष करत म्हटलं.

‘‘असं बघ, प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. कोणताही जीव ही भावना नाकारू शकत नाही. मग आपणच त्यापासून दूर का राहावं?’’ माझ्याकडे गुढपणं बघत हर्षनं म्हटलं.

‘‘हर्ष, काय बोलायचंय ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलू नकोस.’’

‘‘बोलायचं काय? मी विवाहित आहे हे तुला ठाऊक आहे. सगळ्या शहरात माझ्या वडिलांचा दबदबा आहे. त्यामुळेच मी या मार्गावर तुझ्याबरोबर फार काळ राहू शकत नाही. पण जी प्रगाढ मैत्री आपल्या दोघांमध्ये आहे, ती मैत्री मला एवढा अधिकार तर नक्कीच देते की मी कधीतरी तुला किस करू शकतो…खरं ना? अन् वावगं काय आहे? प्रेम ही तर सर्व कालिक, सर्वव्यापी भावना आहे.’’

मी काही प्रतिक्रिया देणार, काही बोलणार, त्या पूर्वीच त्यानं मला पटकन् एका झाडाआड ओढलं अन् माझ्या ओठांवर स्वत:चे ओठ ठेवले. एक दिर्घ चुबंन घेऊन तो म्हणाला, ‘‘बघ तू, एक दिवस जगातल्या सर्वश्रेष्ठ चित्रकारांमध्ये तुझी गणना होईल. जगातल्या ख्यातनाम आर्ट गॅलरीत तुझी चित्र मांडलेली असतील. गेले काही महिने माझे पपा फार कामात होते, त्यामुळे तुझ्या स्कॉलरशिपसाठी मला बोलता आलं नाही. पण आज घरी गेलो की आधी हाच विषय काढतो.’’

काही क्षणांच्या या अनैच्छिक जवळकीनंतर त्यानं मला मिठीतून मुक्त केलं अन् तेच जुनं दळणं पुन्हा तो दळू लागला.

मीही मूर्खासारखी मान डोलावली. जणू मी त्याच्या हातातली कठपुतळी होते.

‘‘रिलॅक्स डार्लिंग, लवकरच तू एमएफ हुसेनच्या बरोबरीनं उभी राहशील…चल, मी तुला तुझ्या फ्लॅटवर सोडतो. मग मी माझ्या घरी जाईन.’’ कारचा दरवाजा माझ्यासाठी उघडत हर्षनं म्हटलं.

घरी पोचेतो बरीच रात्र झाली होती. बाहेरूनच हर्षनं ‘गुडबाय’ केलं. मी मात्र खूपच सैरभैर झाले होते. खूप अस्वस्थ, बेचैन वाटत होतं. कळत नकळत मी अशा एका वाटेवर पोहोचले होते, जिथून मला काही म्हणता काही मिळणार नव्हतं, मिळवता येणार नव्हतं. दूरवर नजर टाकली तरी काहीही दिसत नव्हतं. माझं ध्येय, माझं लक्ष्य…काहीच दृष्टीपथात नव्हतं. माझ्या लक्षात आलं होतं की मी एका भूलभुलैय्यात अडकले होते. माझ्या नशिबात नेमकं काय होतं? ही माझी नियती होती की माझाच मूर्खपणा? मी हर्षच्या प्रेमात वेडी झाले होते की त्याच्या एमएलए वडिलांच्या मोठेपणाची मला भुरळ पडली होती?

प्रश्नांची भेंडोळी डोक्यात गरगरत होती. माझी अन् हर्षची ओळख होऊन एव्हाना दोन वर्षं झाली होती. तो खरोखर मला देवी मानून माझी पूजा करत होता? ही कसली पूजा? त्याला खरोखर वाटतंय का की मी एक महान पेंटर होईन? खराखुरा मित्र म्हणून तो मला मदत करतो. का? गेल्या दोन वर्षांत त्यानं माझं काय भलं केलंय? माझं नाव व्हावं, मला पैसा मिळावा म्हणून त्यानं काय प्रयत्न केलेत?

विचार करता करताच कधीतरी मला झोप लागली. पण सकाळी जागी झाले तरी तेच प्रश्न पुन्हा:पुन्हा फणा काढून समोर येत होते. त्यांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. त्याच क्षणी मला लक्षात आलं की गेली दोन वर्षं मी हर्षमध्ये इतकी गुंतले होते की इतर मित्रमैत्रीणींना पूर्णपणे दुरावले होते. मला एकदम माझ्या जुन्या दोस्त मंडळींची तीव्रतेने आठवण झाली. निदान श्रेयाकडे जाऊन यावं असा विचार करून मी भराभर आवरलं अन् निघालेच!

‘‘इतके दिवस कुठं ग दडून बसली होतीस? किती आठवण यायची तुझी? काहीच पत्ता नव्हता तुझा.’’ श्रेयाच्या आईनं मायेनं जवळ घेतलं, तेव्हा नकळत माझे डोळे भरून आले.

‘‘काही नाही मावशी, एक दोन मोठे प्रोजेक्ट होतं. पेंटिग्ज करण्यातच गुंतले होते, पण मलाही तुमची फार आठवण यायची.’’ मी म्हणाले.

मला पुन्हा जवळ घेत मावशी म्हणाली, ‘‘ठिक आहे, आता आलीस हे ही छान केलंस, काय घेतेस? चहा की कॉफी? की खायला करू काहीतरी?’’

‘‘ ते नंतर, आधी सांगा, श्रेया कुठाय? दिसत नाहीए घरात?’’

‘‘श्रेया येईलच! तुझं खाणंपिणं आटोपतंय तोवर तीही येईलच की! आज तिच्या सतार वादनाचा कार्यक्रम आहे. खूप दिवस ती मेहनत करत होती, या कार्यक्रमामुळे तिला बराच फायदा होईल असं म्हणत होती. भलं व्हावं पोरीचं…’’ बोलता बोलता मावशी भावनाविवश झाल्या.

मला मनातल्या मनात लाज वाटत होती. माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या आयुष्यातल्या एवढ्या महत्त्वाच्या प्रसंगी मी नसावं, मला त्याची माहितीही नसावी? इतका दुरावा आमच्यात कधी निर्माण झाला?

मावशींशी बोलता बोलता तासभर कधी संपला ते कळलंच नाही. दाराची घंटी वाजली. मावशीनं दार उघडताच एखाद्या वादळासारखी श्रेया घरात शिरली अन् तिने आईला मिठीच मारली. आनंदानं तिचा चेहरा केवढा उजळला होता. सर्वांगावर जणू तेज आलं होतं.

‘‘आई, अगं आज ना कार्यक्रम खूपच छान द्ब्राला.’’ आनंदानं चित्कारत होती श्रेया. ‘‘अगं आपले एमएलए साहेब सहकुटुंब कार्यक्रमाला आले होते. तेच आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट होते. कार्यक्रमानंतर त्यांचा मुलगा मला मुद्दाम भेटायला आला. हर्ष नाव आहे त्याचं. अगं, त्यानं माझ्या सतार वादनाचं केवढं कौतुक केलं.’’ म्हणाला, ‘‘युवर म्युझिक इज द फुड फॉर द सोल.’’ मला म्हणाला, ‘‘एक दिवस तू रवीशंकरांसारखीच ख्यातर्कीती सतार वादक होशील.’’ मला त्यानं प्रॉमिस केलंय, तो मला संगीत अकाडमीची स्कॉरलरशिप मिळवून देणार आहे.’’

श्रेयाचं माझ्याकडे लक्षच गेलेलं नव्हतं. ती तिच्याच नादात होती. पण हर्ष आणि त्याचं बोलणं मला आमच्या पहिल्या भेटीची आठवण करून देत होतं. त्या हलकटानं आता श्रेयाचा मासा जाळ्यात ओढला होता. माझं अवसानंच गळालं. स्वत:च्या भावनांना आवर घालणं अवघड झालं. मला आता ताबडतोब घरी जायचं होतं. मला कुणालाही काही सांगायचं, विचारयचं नव्हतं. आता मला गेल्या दोन वर्षांतल्या माझ्या आणि हर्षच्या मैत्रीचा शेवट करायचा होता.

तेवढ्यात श्रेयाचं लक्ष माझ्याकडे गेलं. तिनं धावत येऊन मला मिठी मारली.

‘‘श्रेया, अगं मला बरं वाटत नाहीए…मी तुला नंतर भेटते. आता मला घरी जाऊ दे…’’ मी श्रेयाचा चेहरा माझ्या दोन्ही हातांच्या ओंजलीत घेऊन तिचे लाड केले. माझा आवाज खोल गेला होता.

‘‘अगं, खरंच, किती वेल आणि थकलेली वाटते आहेत तू? मी येऊ का तुला घरी सोडायला?’’ श्रेया मनापासून म्हणाली.

‘‘नको, फक्त रिक्षा मागवून दे…’’

मावशी व श्रेयाचा निरोप घेऊन कशीबशी घरी पोहोचले तोवर संध्याकाळ झाली होती. पण माझ्या मनावर साचलेला काळोख मात्र पूर्णपणे दूर झाला होता. त्या प्रकाशात मला हर्षचं विकृत रूप स्पष्ट दिसत होतं. कसला बहुरूपी होता. सोंग घेणारा बहुरूपी. जो आपल्या सुविद्य पत्नीला मान देत नाही तो इतर स्त्रियांना काय मान देणार? त्याला कलेतलं खरं तर काहीच कळत नाही. पण चांगलं रंग रूप अन् एमएलए बाप याच्या बळावर तो नवोदित कलाकार, तरूणींना आमिषं दाखवत जाळ्यात ओढतो. माझ्यासारख्या मूर्ख मुली फसतात. खरं तर मला कळायला हवं होतं की गेल्या काही वर्षात जे काही नाव मी मिळवलं होतं ते स्वत:च्या मेहनतीवर, जो पैसा मिळवला ती पेंटिग्ज माझ्या बळावर विकली म्हणून. माझी कला, माझी प्रतिभा हेच माझं साधन होतं. कुणा अशिक्षित एमएलएच्या उडाणटप्पू, अकर्मत्य मुलाच्या शिफारसीमुळे नाही.

मुळात माझ्या आणि हर्षच्या कथेची सुरूवातच चूक होती. काळाबरोबर त्यात जे काही अध्याय जोडले जात होते त्यामुळे ती अधिकच बिघडत होती. आता माझ्या मनाच्या आरशावरची धुळ पुसली गेली होती. हर्षचा विद्रुप चेहरा स्पष्ट दिसला होता. तो माझ्या आयुष्यात मला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आलाच नव्हता. पतनाच्या निसरड्या वाटेवर तो मला घेऊन गेला हाता. ही कथा फार सामान्य अन् हीन अभिरूचीची झाली होती. तिची शोकांतिका, विद्रुप शोकांतिका होण्यापूर्वीच तिचा शेवट करायला हवा. त्याचक्षणी श्रेयाला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी काय काय करायचं याचा निर्णय घेतला अन् पुढे हर्षला कधीही न भेटण्याचाही निर्णय घेतला. माझा मोबाइल उचलला अन् त्यावरचा हर्षचा नंबर कायमचा ब्लॉक करून टाकला.

आता मला खूप छान वाटत होतं. स्वत:विषयीची ग्लानी किंवा दयेची भावना आता नव्हती. पूर्ण आत्मविश्वासानं, आत्म तेजानं माझा चेहरा उजळला होता.

व्हर्लपूल

कथा * माधव गवाणकर

बकाल वस्तीतला मी एक कंगाल कवी होतो. शे पन्नास रुपये मिळाले तरी त्यासाठी रेडिओ केंद्रापर्यंत रेकॉर्डिंगसाठी जायचो. स्वत:चा दिवाळी अंक काढून पुरता फसलो होतो. कर्जात बुडालो होतो. मनात ‘नकारात्मक’ विचार खूपदा यायचे. समुद्र त्यादृष्टीने जवळ होता. मला पोहता येत नव्हतंच. पूर्णवेळ लेखनाच्या उचापती अंगाशी आल्या होत्या. बेरोजगारी घामोळ्यासारखी टोचतदाह करत होती.

विजेची दोन महिन्यांची बिलं भरायची बाकी होती. गॅस बाकबुक करत होता. त्याचा जीव कधीही गेला असता. माझं जेवण मीच करायचो, पण गॅस तर पाहिजे. तरी बरं संसाराचं ओझं नव्हतं. मरून गेलो तरी माझा मीच होतो. मी आरशात स्वत:ला पाहिले. अगदी लाचार, ओशाळवापणा फिकट वाटत होतो मी. कुणालाही माझा उपयोग नाही आणि या पैशाच्या तालावर नाचणाऱ्या महानगरात जगण्याची आपली पात्रता नाही याची खात्री पटू लागली होती.

क्लासमेट हेमू माझ्या गरिबीचा वास काढत नेमका येऊन थडकला. मऊ स्वरात त्याने चौकशी केली. त्याचे शब्द धीर देऊ लागले. खानदानी, वडिलोपार्जित संपत्तीचं काय करायचं चैन तरी करून किती करणार? असा हेमूसमोर सवाल असायचा. मी रोज रेडिओवर कार्यक्रम केला असता, तरी हेमूच्या गळ्यात जी सोन्याची जाडजूड जड चेन होती, तशी मला घेता आली नसती. हेमू समलैंगिक आहे आणि महिलांऐवजी पुरुषांकडे अधिक आकर्षित होत असल्याने मला त्याची थोडी भीतिच वाटायची. पण मी बेकारीमुळे अगदी फाटकातुटका झालोय हे हेरून तो माझ्या त्या पावसात गळणाऱ्या रुमवर येऊ लागला होता. त्याची कार माझ्या रंग जाऊन भंग झालेल्या घरापाशी अजिबात शोभत नसे.

‘‘असा का दिसतो आहेस तू? आजारी वाटतोयस…. चणचण आहे का पैशाची?’’ हेमूने अचूक ठिकाणी बोट ठेवलं.

‘आहे खरी, पण…’’

‘‘असे कितीसे लागतील?’’ या प्रश्नात त्याला असं सुचवायचं असावं की एक कवी मागून किती मागणार? मोठी रक्कम मागण्याचं तुला धैर्यच होणार नाही.’’

‘‘सध्या हजार रुपये पुरतील. नोकरी लागल्यावर शे दोनशे करत फेडेन मी सगळे…’’ मी इमानदारीत बोललो. बांगड्या किणकिणतात तसा तो हसला.

मधाच्या पोळ्याकडे अस्वलाने बघावं तशी गढूळ नजर लावत मग त्याने इरादा सांगितला. ‘‘परत कसले करतोस! हे घे, राहू दे तुलाच. आता फक्त एक गोष्ट माझ्यासाठी करायची… थोडा वेळ… से, हाफ अॅन अवर… मलाच तुझी बायको समजायचं.’ तू तरुण पुरुष आहेस आणि तेवढं मला पुरेसं आहे…’’ माझ्या छातीची धडधड वाढली. पैसे ही माझी तातडीची निकड होती, पण ‘कृत्य’ करायला मन धजावत नव्हतं. कच खात होतं. तशी सवय नव्हती.

तेवढ्यात हेमूने किंचित कडक स्वरात म्हटलं, ‘‘तुम्ही मिडलक्लासवाले नुसताच विचार करत बसता. सोडून दे ही वृत्ती. ये, असा जवळ…’’ नंतर मला काही बोलू न देता, त्याने जवळीक साधली. त्या प्रसंगाचं वर्णन कशाला करायचं. ते काही प्रेम नव्हतं! ती मजबुरी होती. हेमूला जे साधायचं होतं, ते त्याने साधलं.

पैसे तर त्याने रोख दिलेच होते. तो निघूनही गेला.

नंतर मात्र मला रडू कोसळलं. आईवडिलांचा मृत्यू आधीच झालेला होता. माझं सख्ख असं कोणी शिल्लक नव्हतं. आपण जणू फुटपाथवर झोपतो आणि कुणीही आपल्याला वापरू शकतं असा फील मला आला. परिस्थितीचा भोवरा माणसाला काय करायला भाग पाडतो ते माझं मलाच कळून चुकलं. हा ‘व्हर्लपूल’ फार भयानक असतो. स्नान केल्यावरही मला स्वच्छ वाटेना. नंतर मला अर्धवेळ का होईना, नोकरी मिळाली. तंगी कमी झाली, पण आपल्या विषमतेने पोखरलेल्या या देशात धनदांडगी माणसं सहजपणे आमचं पौरुषत्व लुटू शकतात आणि आमच्यावर केवळ पोट जाळण्यासाठी तेही करणं भाग पडतं असाच शिक्का यातून बसतो. कुणी म्हणेल शिक्का, कुणी म्हणेल डाग. मात्र कलंक असं म्हणताना, गरीब माणसाची हतबलताही लक्षात घेतली पाहिजे… घेतलीच पाहिजे!

मनोमिलन

कथा * प्राची भारद्वाज

सकाळी फारसं दाट नसलेलं धुकं दुपारपर्यंत खूपच वाढलं. बहुतेक दिवस फारसा उत्साह, आनंदाचा नसावा हे हवामानालाही जाणवलं होतं. वातावरण उदास होतं त्यामुळे मनावर मलभ अन् मनावर मलम म्हणून वातावरण कोंदलेलं. समीक्षा अगदी गप्प होती. स्वत:चं आवरत होती. मनांत ना कोणती स्वप्नं ना कणभरही उत्साह. तिला बघायला एक स्थळ येणार होतं. घरच्यांच्या इच्छेखातर ती तयार झाली होती. सुरूवातीला तिच्या उत्तम नोकरीमुळे तिनं अनेक स्थळं नाकारली होती. असं करता करता वय तेहेतीस वर्षांचं झालं अन् लग्न ठरेना. हळूहळू स्थळंही येईनात. वर्ष सहा महिन्यात एखादं स्थळ कुणी सुचवलंच तर ते अगदीच खालच्या पातळीवरचं असे.

प्रोफेशनल जगात समीक्षाचं फार छान नाव होतं. ती तिच्या कंपनीची वॉइस प्रेसिडेंट आहे. स्वत:ची सुसज्ज केबिन, किती तरी कर्मचारी हाताखाली काम करताहेत. परदेशच्या वाऱ्या तर सतत सुरू असतात. तिच्या क्षेत्रातली सर्वच माणसं तिचा आदर करतात, मान देतात पण एवढं सगळं असूनही लग्नाचं वय निघून चाललंय म्हणून घरचे, बाहेरचेही नावं ठेवतात. मुलींच्या आयुष्याची हीच शोकांतिका आहे. करीअर करताना लग्न मागे ठेवावं लागतं अन् लग्न केलं तर करिअर करता येत नाही. घर संसार, नवरा, सासर, मुलंबाळं सांभाळूनही करीअर उत्तम करणारी सुपरवूमन सगळ्याच कशा होणार?

‘‘समीक्षा, आवरलं का? ते लोक येतंच असतील.’’ आईच्या हाकेनं ती विचारांच्या तंद्रीतून भानावर आली.

‘‘आमच्या मुलीनं खूप लहान वयात एवढी मोठी मजल मारली आहे.’’ वडील अभिमानानं सांगत होते.

‘‘ते ठीक आहे पण स्वयंपाक, घरकाम येतंय की फक्त ऑफिसरकीच करते?’’ सासूनं परखडपणे विचारलं. थोड्या जुजबी गप्पा, चहा फराळ आटोपून मंडळी निघून गेली.

‘‘विचार करू सांगतो,’’ हे घालून गुळगुळीत झालेलं वाक्यंच पुन्हा ऐकवलं. उत्तर येणार नव्हतं, नाही आलं.

समीक्षाच्या लग्नासाठी उतावीळ झालेले घरचे लोक आता अगदी कुणाशीही तिचं लग्न लावून द्यायला तयार हाते. पण आता इतका मोठा मानन्मान अन् पगारअसलेली मुलगी मुलंच नाकारत होती.

नकार ऐकून थकली होती ती. घरचे मात्र अजूनही तिचं प्रदर्शन मांडायला उत्साहानं सरसावंत होते. शेवटी अगदी रडकुंडीला येऊन तिनं वडिलांना म्हटलं, ‘‘बाबा, प्लीज, आता हे सगळं थांबवा ना! जो कुणी येतो, तो माझे गुण न बघता दोषांचीच चर्चा करतो…कंपनीत, समाजात इतका मान मिळवलाय मी, अश्या फत्रुड मुलांकडून नकार घेताना माझ्या मनाला किती यातना होतात ते समजून घ्या ना, मला हे सहन होत नाही.’’

समीक्षाचं लग्न ठरेना तेव्हा तिनंच धाकट्या भावाचं लग्न करून द्या म्हणून आई वडिलांवर दबाव आणला. आता तिनं मनांतून लग्नाचा विचार पार काढून टाकला होता. जे व्हायचं असेल ते होईल असा निश्चय करून ती आपल्या करिअरच्या जोडीनं सामाजिक काम करणाऱ्या संस्थाना मदत करू लागली. झोपडपट्टीतल्या शाळेत त्या गरीब मुलांना शिकवताना तिला खूप समाधान वाटायचं, ज्या स्वयंसेवी संस्थेत ती काम करायची, त्याच संस्थेत दीपकही यायचा. साधारण चाळीशी ओलांडलेला असावा. वागण्यात बोलण्यात ऋजुता अन् परिपक्वता जाणवयाची. समीक्षा त्याच्याशी मोकळेपणानं बोलायची. त्याचे अनुभव तो सांगायचा. काम करताना तिला त्याचा उपयोग व्हायचा.

त्या दिवशीची कामं आटोपल्यावर दोघं संस्थेच्या कॅन्टीनमध्ये कॉफी घेत असताना दीपकनं विचारलं, ‘‘समीक्षा, रागावणार नसलीस तर एक विचारू का? अजूनपर्यंत तू लग्न का नाही केलंस?’’

समीक्षा हसली. ‘‘खरं तर सुरूवातीची खूप स्थळं मीच नाकारली. नंतर लोक मला नाकारायला लागले. आता मी सगळं परिस्थितीवर सोडलंय…मी ऐकलंय, तुमचं लग्न झालं होतं पण तुमची पत्नी…’’ बोलता बोलता समीक्षानं वाक्य अर्धवटच सोडलं.

‘‘अरेच्चा? इतकं ऐकलंय तू? खरंय ते, लग्न झालं होतं पण सगळेच लोक जन्मभर एकमेकांना साथ देतातंच असं नसतं ना?’’ काही क्षण थांबून दीपकनं पुढे सांगितलं, ‘‘मी लोकांना खोटंच सांगितलंय की माझी पत्नी वारली…पण खरं सांगायचं तर ती मला सोडून गेली. तिला जो पैसा अडका, सोयी सुविधा हव्या होत्या त्या माझ्या वयाच्या तीशीत मी तिला देऊ शकलो नाही.’’

एक दिवस ऑफिसचं काम संपवून मी लवकर घरी पोहोचलो अन् दाराशी माझ्या बॉसची गाडी दिसली. मला नवलंच वाटलं. माझा बॉस माझ्या घरी? काय कारण? मी दारावरची बेल दाबली, दार लवकर उघडलं नाही. तीनदा बेल वाजल्यावर बायकोनं दार उघडलं अन् मला दारात बघून ती दचकली. तशीच आत धावली…मला काही गळेना, तिच्या पाठोपाठ मीही खोलीत शिरलो..माझ्या बेडरवर माझा बॉस…’’

बोलता बोलता संताप, अपमान, असहायता अशा संमिश्र भावनांनी दीपकचा आवाज कापू लागला. काही क्षण तो मान खाली घालून बसला…मग म्हणाला, ‘‘मागच्या चार महिन्यांपासून माझ्या बायकोचं बॉसबरोबर अफेअर सुरू होतं. आमच्या घटस्फोटानंतर तिनं माझ्या बॉसशी लग्न केलं.’’ दीपक अजूनही त्या मन:स्थितीतून बाहेर आला नव्हता.

काही क्षण शांततेत गेले. समीक्षानं त्यांच्या खांद्यावर थोपटून त्याला शांत केलं. हळूवारपणे विचारलं, ‘‘हे सगळं तुम्ही मला का सांगितलंत?’’

दीपकनं समीक्षाकडे बघितलं. सरळ तिच्या नजरेला नजर भिडवली. त्या नजरेतलं आकर्षण अन् ओढ समीक्षाला जाणवली. तिनं त्याची नजर टाळली. मग वातावरण मोकळं करण्यासाठी तिनं विचारलं, ‘‘दीपक, इतक्या वर्षात तुम्ही दुसरं लग्न का केलं नाहीत?’’

‘‘तुझ्यासारखी कुणी भेटलीच नाही.’’

समीक्षा एकदम बावचळून उठून उभी राहिली. मनांतून तिलाही दीपक विषयी आकर्षण वाटत होतं. दीपकलाही तिच्याबद्दल ओढ वाटतेय हे तिल कळंत होतं पण असं एकाएकी तो इतकं स्पष्ट बोलेल असं तिला वाटलं नव्हतं. अर्थात् एकमेकांची मनांतली इच्छा एकमेकांना कळली हेही छानच झालं.

समीक्षाकडून होकार कळताच दीपकनं म्हटलं, ‘‘समीक्षा, मी जे सांगतोय, ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं नाहीए. पण तुला माहीत असायला हवं, म्हणून सांगतोय. मी ख्रिश्चन आहे. माझ्यासाठी धर्म तेवढा महत्त्वाचा नाहीए. मी कर्म करण्यावर विश्वास ठेवतो. या आयुष्यात आपण अनेकविध लोकांच्या संपर्कात येतो त्यांच्याबरोबर काम करतो, त्यांच्याकडून मदत देतो व घेतो, बरंच काही शिकतो, मग तो कोणत्याही धर्माचा का असेना, धर्म त्या गोष्टींच्या आड येत नाही. तसंच, आयुष्याचा जोडीदार निवडतानादेखील धर्म आड येऊ नये असं मला वाटतं. तुझ्या रूपापेक्षा तुझे गुण मला भावले अन् धर्माच्यामुळे एक चांगली जीवनसंगिनी मला घालवायची नाहीए…मी सतत तुला आधार देईन हे माझं वचन आहे…पुढे तुझी इच्छा.’’

समीक्षालाही दीपकचं व्यक्तिमहत्त्व, त्याचे विचार, त्याचं काम आवडंत होतं. विशेषत: तो तिच्यावर प्रेम करतोय, तिला मान देतोय, हे समजल्यावर तर तिला दीपकबद्दल अधिकच प्रेम वाटू लागलं होतं. पण धर्म हा एक फारच मोठा प्रश्न होता. इतका मोठा निर्णय ती एकटी घेऊ शकत नव्हती. कारण आपल्याकडे मुलींना संस्कारच असे दिले जातात की ती त्यांची शक्ती ठरत नाहीत तर बेड्या ठरतात. कितीही कमवती, उदात्त विचार असणारी, कर्तबगारर मुलगी असू दे, थोडासाही वेगळा निर्णय घेण्याआधी तिला कुटुंबाचा, समाजाचा विचार करावाच लागतो. पुरूष कोणताही निर्णय सहज घेतो, स्त्रीला मात्र फार विचार करावा लागतो. अगदी आज भाजी काय करू इथपासून प्रत्येक गोष्ट ती विचारून करते. तेच तिचे संस्कार असतात.

समीक्षानं आईला आपला विचार सांगितला. तिचं मत विचारलं.

‘‘तुझं दीपकवर प्रेम आहे?’’ आईनं प्रश्न केला.

‘‘आई, माझं दीपकवर प्रेम आहेच, पण तो मला पसंत करतो, माझ्यावर प्रेम करतो, मला आधार देतो हे अधिक महत्त्वाचं नाही का?’’ समीक्षा म्हणाली.

आईनं म्हटलं, ‘‘हे बघ समीक्षा, तुझं वय आता लहान नाही. तुला मी ओळखते. वावगं तू कधीच वागणार नाहीस. तुझं लग्न व्हावं, संसार थाटावा, तू सुखी व्हावंस हीच माझीही इच्छा आहे. फक्त दुसऱ्या धर्मातल्या कुटुंबात तू स्वत:ला एडजेस्ट करू शकशील का? नीट विचार करून निर्णय घे.’’

समीक्षाच्या आईनं होकार दिल्यावर दीपकनं तिला आपल्या घरी नेलं. दीपकचे वडील वारले होते. घरात एक धाकटा भाऊ व आई होती. एका बहिणीचं लग्न झालेलं होतं. समीक्षाला दीपकची आई आवडली. तिच्या आईसारखीच सरळ साध्या स्वभावाची, प्रेमळ स्त्री.

‘‘लग्नानंतर कोण कसं वागेल याची खात्री देता येत नाही. दीपकचं पहिलं लग्न आम्ही जातीतली मुलगी बघून करून दिलं होतं…पण काय झालं? आज इतक्या वर्षानंतर त्यानं तुला पसंत केलीय, याचाच अर्थ तुझ्यात त्याला काही तरी विशेष दिसलंय…’’ आईनं सांगितलं. ‘‘तुम्ही दोघं लग्न करून सुखात रहा. माझे आशिर्वाद आहेत.’’

दीपकच्या भावाला मात्र ही हिन्दु मुलगी नापसंत होती. त्यानं बहिणीलाही फोन करून बोलावून घेतलं. तिनंही बराच तमाशा केला. ‘‘लग्न करायचं होतं, तर मला सांगायचंस, एका वरचढ एक मुली मी आणल्या असत्या. तू विचार कर, एक हिन्दु मुलगी एका घटस्फोटित ख्रिश्चन मुलाशी, तो ही एवढा चाळीशी ओलांडलेला, लग्नाला संमती देतेय, म्हणजे तिच्यात काही तरी दोष असणारंच…इतकं वय होई तो तिचं लग्न झालेलं नाही म्हणजे आधीची काही प्रकरणंही असतील…तुला काही माहीत आहे का? की तू आमच्यापासून लपवतो आहेस?’’

दीपक मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. जेव्हा मनानं पुल तयार केलाय तर त्यावरूनच तो त्याचा प्रेमाचा मुक्काम गाठणार आहे. मुळात मनोमीलन महत्त्वाचं असतं.

दीपक व त्याची आई विवाहाला सहमत आहेत याचा समीक्षाला आनंद झाला पण त्याचे भाऊ-बहिण विवाहाविरूद्ध आहेत ही भावना तिला छळंत होती. आता समीक्षाला आपल्या घरात वडिलांना व भावांना ही गोष्ट सांगायची होती. घरात वादळ उठणार याची तिला खात्री होती. तिनं सांगितल्यावर तसंच घडलं.

‘‘तुला लाज नाही वाटली स्वत:च स्वत:चं लग्न ठरवतेस, ते ही एका वेगळ्या जातीच्या मुलाबरोबर…थोडा तरी आमच्या इभ्रतीचा विचार करायचास?’’ धाकटा भाऊ ओरडत होता…याच भावाचं लग्न आपल्यामुळे लांबू नये म्हणून समीक्षानं आईवडिलांना शपथ घालून त्यांचं लग्न करून द्यायला भाग पाडलं होतं.

‘‘मी कुठल्या तोंडानं समाजात वावरायचं? माझ्या माहेरी अजून धाकट्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे, तिच्या लग्नात अडथळा येईल ना या तुझ्या विधर्मी लग्नामुळे,’’ भावाची बायको तरी मागे का राहील? तिनंही बोलून घेतलं.

‘‘शेवटचं सांगतोय समीक्षा, लग्न करशील तर माझ्या प्रेताला ओलांडूनच घराबाहेर जाशील. स्वत:चं सौभाग्य हवंय का आईचं हे तू ठरव.’’ बाबा निर्वाणीचं बोलले.

त्या रात्री समीक्षा व तिची आई आपापल्याअंथरूणावर तळमळत होत्या. रडत होत्या. पुढे नेमकं काय घडणार आहे ही अज्ञान काळजी दोघींनाही छळंत होती.

दुसऱ्यादिवशी वडिलांनी त्यांच्या बहिणीला, समीक्षाच्या आत्याला बोलावून घेतलं. समीक्षाचं अन् तिचं बऱ्यापैकी जमायचं. म्हणून बाबांनी समीक्षाला लग्नापासून परावृत्त करण्यासाठी तिचा आधार घेतला. आत्यानंही हरतऱ्हेनं तिला समजावलं. शपथा घातल्या. इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं. भाऊ, भावजय, वडिल, आत्या सर्वांनी घसा कोरडा होईपर्यंत ओरडून घेतलं.

समीक्षा मुकाट्यानं ऐकत होती. शेवटी उठता उठता अगदी शांतपणे म्हणाली, ‘‘मीही एकच सांगते. केलं लग्न तर दीपकशीच करेन नाही तर अशीच कुंवारी राहीन.’’

तिला वाटलं होतं यावर काहीतरी प्रतिक्रिया येईल. पण तिच्या लग्न न करण्याच्या निर्णयाचं स्वागत झालं. तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करून तिनं सुखाचा संसार करावा हे मात्र मान्य झालं नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळीच वडील म्हणाले, ‘‘मी समीक्षासाठी मुलगा बघितलाय…आपल्या गोपीनाथचा भाचा. ओळखीतली माणसं आहेत. त्यांनाही लग्नाची घाई आहे अन् आम्हालाही…’’ समीक्षाकडे तिरस्कारानं बघंत ते आपल्या खोलीत निघून गेले.

जमीन दुभंगावी अन् आपण त्यात गडप व्हावं असं झालं समीक्षाला. त्याच सायंकाळपासून हिंदुत्त्व प्रचारक सेनेचे प्रमुख गोपीनाथच्या भाच्याचे गुंड समीक्षाच्या मागावर सुटले. तिच्या ऑफिसच्या बाहेर पहारा करायचे, रस्त्यावर तिच्या मागे मागे असायचे. दीपकची व तिची भेट होऊ नये म्हणून त्यालाही धमकी द्यायचे. तीन दिवसात समीक्षा वैतागली, पार दमली.

मुलींना आपण शिकवतो, त्यांनी नोकरी करावी, स्वावलंबी व्हावं असं आपल्याला वाटतं. पण एखाद निर्णय त्यांनी त्यांच्या मनानं घेतला तर तो आपल्याला सहन होत नाही. मुलीला स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा हक्क असू नये? तिचा आनंदही समाजानं ठरवावा? कुटुंबासाठी तिनं जीव द्यावा तर ती महान ठरते पण स्वत:साठी काही मागितलं तर तिला निर्लज्ज म्हणायचं? आईचा जीव विचार करून घाबरा झाला. पोरीची तिला कीव आली. स्वत:चीही कीव आली. या क्षणी तिच्या पाठीशी उभं रहायलाच हवं मग काय वाट्टेल ते होऊ दे.

रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळे मजेत जेवत होते. फक्त समीक्षाच दु:खी होती. समीक्षानं लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांचा प्रश्न मिटला होता.

अचानक आई म्हणाली, ‘‘समीक्षा, तू मनांतली काळजी काढून टाक. आत्तापर्यंत या घरातली सगळी नाती तू उत्तम प्रकारे निभावली आहेस. तू चांगली मुलगी आहेस, बहीण आहेस, भाची आहेस, पुतणी आहेस. आता आम्ही जबाबदारी पार पाडायची आहे. आम्ही तुझ्या आणि दीपकच्या लग्नाच्या आड येणार नाही. ती सुखी रहा.’’

वडील काही म्हणणार तेवढ्यात त्यांना थांबवंत तिनं म्हटलं, कर्तव्य फक्त मुलींचीच नततात. कुटुंबाचीही असतात. दीपकच्या आईला मी भेटते अन् लग्नाचं नक्की करते.

वडील आश्चर्यानं बघत असताना त्यांच्या नजरेला नजर भिडवून आई अगी निर्णायक आवाजात म्हणाली, ‘‘माझं आयुष्य सरत आलंय, आता विधवा काय मला फरक पडणार नाही पण लेकीचं लग्नं झालेलं, तिचा सुखाचा संसार मला बघायचा आहे.’’

लग्न होणार हे नक्की झालं तरी दोन्ही कुटुंबात फारसा उत्साह नव्हता. समीक्षाच्या वडिलांनी पत्रिका छापल्या नाहीत. कारण त्यावर बायबलच्या ओळी लिहाव्या लागतील. दीपकच्या नातलगांना पत्रिकेच्या वरच्या गणपतीचं चित्र खटकंत होतं. नवरा नवरीच्या मनांत विघ्न येईल का ही काळजी होती. पण दोघांच्या आयांनी मात्र खूप प्रेमानं अन् उत्साहानं आशिर्वाद दिले.

लग्न झालं तरी समीक्षाच्या मनांत थोडं दु:ख होतं.

‘‘सगळ्यांनी सहकार्य केलं असतं तर किती छान झालं असतं.’’ तिने बोलून दाखवलं.

दीपकनं तिची समजूत घातली, ‘‘हे बघ, आपण एकमेकांवर प्रेम केलं, करतोय, पुढेही हे प्रेम असंच राहील. याप्रेमामुळेच आपण एकमेकांना निवडलंय. घरची माणसं खरंच आपल्यावर प्रेम करत असतील, आपल्या आनंदात आनंद बघत असतील तर आपल्याकडे येतीलच येतील.’’

समीक्षालाही ते पटलं. आता मनांत कोणतीही शंका नव्हती. फक्त डोळ्यात उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्नं होती.

समाधान

कथा * ऋचा गुप्ते

शेजारच्या खोलीतून मघापासून बोलण्याचे आवाज ऐकायला येत होते. संभाषण साधच असावं पण दोघंही इतकी हसत होती की सांगता सोय नाही. काय करताहेत दोघं? रमणच्या छातीत शूळ उठला होता. रमणच्या मनात आलं की उठून त्या कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन दार लावून मोठ्या आवाजात संगीत सुरू करावं. नकोच ते हसण्या बोलण्याचे आवाज. तरीही मनात एक किडा वळवळत होता. तो त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

काजल गात होती :

‘‘काल पाहिले मी स्वप्न गडे

नयनी मोहरली गं आशा

बाळ चिमुकले खुदकन् हसले

काल पाहिले मी स्वप्न गडे.’’ काजल गात होती अन् रोहन शिटीवर तिला साथ देत होता. सोफ्यावर पडल्या पडल्या रमणनं मनातच त्याला शिवी दिली ‘निर्लज्ज कुठला.’ कुणास ठाऊक आता काय सांगतोय काजलला…इतकी का हसतेय ती…आता मात्र रमणचा संयम संपला. संतापून उठला अन् पाय आपटत काजलच्या खोलीत पोहोचला.

‘‘काय चाललंय मघापासून खिदळणं? इतकं काय घडलंय? अरे, मला स्वत:च्या घरातही काही वेळ शांतता लाभू नये का?’’

रोहननं ‘‘सॉरी-सॉरी’’ म्हणत तिथून काढता पाय घेतला. काजल मात्र अजूनही गुणगुणत होती.

‘‘इवली जिवणी, इवले डोळे,

भुरूभुरू उडती केसही कुरळे,

रूणुझुणु रूणुझुणु वाजती वाळे,

रंग सावळा, तो कृष्ण रडे,

काल पाहिले मी स्वप्न गडे…’’

रोहन तिथं नसल्याने आता रमणला तिचं गुणगुणणं आवडू लागलं. त्याने डोळे भरून काजलकडे बघितलं. सातवा महिना लागला होता. किती सुंदर दिसत होती ती. सर्वांगावर तेज आलं होतं. पूर्वीची एकेरी अंगलट आता गोलाईत बदलली होती. मातृत्त्वाच्या तेजानं झळाळत होती काजल.

गरोदरपणी स्त्री सर्वात छान दिसते. मातृत्त्वामुळे आयुष्याला येणाऱ्या परिपूर्णतेचं समाधान तिला वेगळंच सौंदर्य देतं. रमण अगदी भान हरवून काजलकडे बघत होता, तेवढ्यात रोहननं खोलीत प्रवेश केला. त्याच्याकडे बघताच रमणचं मन कडू झालं. तो झटक्यात वळला. रोहननं वहिनीसाठी काही फळं कापून आणली होती. त्यानं ती प्लेट रमणच्या पुढे केली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रमण खोलीतून बाहेर पडला.

रमणनं सरळ कोपऱ्यातली खोली गाठली अन् कर्कश्श आवाज संगीत लावून खोलीचं दार बंद करून घेतलं. पलंगावर पडून डोळे मिटले तरी कानात रोहन आणि काजलचं हसणंच घुमत होतं. पुन्हा:पुन्हा त्या दोघांचं बोलणं त्याला ऐकायला येत होतं. एकूणच त्याच्या देहमनावर काजल आणि रोहननं असा काही कब्जा केला होता की त्याला इतर काही सुचतंच नव्हतं. त्याचं मन अस्वस्थ होतं, बेचैन झाला होता तो.

त्यातच जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या. त्यामुळे तर तो अजूनच वैतागला होता. आपण चक्क नरकात राहतोय असं त्याला वाटायला लागलं. आपण एखाद्या धगधगत्या अग्नीकुंडात उभे आहोत असाही भास झाला. पिता होण्याचं जे सुख त्याला हवं होतं, त्याचा मार्ग असा अग्नीपथाचा असेल असं त्याला वाटलंच नव्हतं.

काही महिन्यांपूर्वी सगळंच किती छान होतं. रमणच्या मनात आलं…पण खरंच छान होतं की त्यावेळीही मनात काही बोच होतीच? आठवणींचे धागे उसवायला लागले.

लग्नाला सात वर्षं उलटली होती. सुरूवातीची वर्षं, करीअर, प्रमोशन्स, घर, घरातल्या इतर जबाबदाऱ्या यातच खर्ची पडली होती. त्यामुळे रमण व काजलनं मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. दोघांची जोडी फारच छान होती. अगदी अनुरूप अशी. दोघांवरही दोन्ही घरातून खूपच दबाव येत होता. आता घरात पाळणा हलायला हवा. दोघांचे आईवडिल, इतर वडिलधारी, नातलग मंडळी एवढंच काय मित्रमंजळीही आता विचारू लागली होती. रमणच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसाला त्याचे सासूसासरे आले होते.

समारंभ छान झाला. काजलचे वडील म्हणाले, ‘‘सुरेख समारंभ केलात तुम्ही. एवढ्या वर्षात प्रथमच लग्नाचा वाढदिवस साजरा करताय. खरंच, खूप आनंद वाटला.’’

यावर काजलनं उत्तर दिलं, ‘‘होय बाबा, यावेळी खासच प्रसंग आहे. माझ्या धाकट्या दिराचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालंय. यापुढील शिक्षण तो स्वत:च्या स्कॉलरशिपवर पूर्ण करणार आहे. आमचा रोहन डॉक्टर झाला ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे. जणू आमची तपश्चर्या फळाला आली. तो आनंद साजरा करायला आम्ही हा समारंभ आयोजित केलाय.’’

रमणच्या आईनं काजलच्या आईला म्हटलं, ‘‘ताई, आता तुम्हीच या दोघांना समजवा. घरात नातवंडं बघायला आम्हीही आतुरलो आहोत. आता अधिक उशीर करायला नको.’’

‘‘खरंय तुमचं म्हणणं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. वेळच्यावेळी सर्व होणं जरूरी आहे. आमचंही वय होतंय ना आता…’’

आता रमण आणि काजललाही आपल्या बाळाचे वेध लागले होते. पण काही महिन्यातच काजलच्या लक्षात आलं की काही तरी चुकतंय. दोघांनीही आपली पूर्ण तपासणी करून घेतली. इतकी वर्षं मुलाचा विचारच केला नव्हता. आता मूल हवंय अन् होत नाही म्हटल्यावर दोघंही काळजीत पडली. तपासणीत रमणमध्ये दोष आढळला. असा देखणा, निरोगी, हुशार तरूण पण मूल जन्माला घालणं त्याला शक्य नव्हतं.

‘‘रमण हताश झाला. पण काजलनं त्याला धीर दिला. पूर्ण विचारांती स्पर्मबँकेतून स्पर्म घेऊन काजलच्या स्त्री बीजांशी त्यांचा संयोग घडवून काजलच्या गर्भाशयात ते सोडणं आणि मग गर्भाशयात गर्भ वाढवणं असा निर्णय घेतला गेला.

काजलला वाटत होतं की ही बातमी गुप्त ठेवावी. पण रमणचं म्हणण पडलं की आपण ही गोष्ट लपवूया नको.’’

मग सगळ्या कुटुंबीयांसमोर रमणचा हात हातात घेऊन काजलनं त्यांचा प्लॅन सांगितला.

रोहननं म्हटलं, ‘‘छोटी आई, तुम्ही इतर कुठंही जाऊ नका. मी जिथं काम करतो, तिथं या गोष्टीची उत्तम व्यवस्था आहे. मी त्या विभागाच्या मुख्य डॉक्टरांशी बोलतो.’’

दोघांच्या आईवडिलांनी एकमेकांशी चर्चा केली, तेव्हा रमण अन् काजल आपल्या बालकनीत बसून समोर बागेत खेळणाऱ्या मुलांकडे बघत आपलं मूल कसं असेल याचं स्वप्न विणत होते.

काजल सतत रमणबरोबर होती. त्याच्या दोषाबद्दल ती चकार शब्द बोलत नव्हती. उलट जणू तिच्यात दोष आहे असंच वागत होती.

काजलची सासू म्हणजे रमणच्या आईनं म्हटलं, ‘‘असं घडतं का?’’

‘‘अशा पद्धतीनं जन्माला आलेलं मूल निरोगी असतं का?’’ रमणच्या वडिलांनी विचारलं.

काजलच्या आईनं म्हटलं, ‘‘पण मूल कुठल्या वंशाचं, घराण्याचं असेल हे कसं कळावं?’’ काजलच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘जर हाच पर्याय असेल तर आपल्याच कुटुंबातील कुणाचे स्पर्म मिळवता येतील का? निदान कुळ, घराणं याबाबतीत संशय उरणार नाही.’’

बराच वेळ सगळे गप्प होते. शेवटी रमणनंच म्हटलं, ‘‘आम्ही गुपचुप हे करू शकलो असतो, पण तुम्हाला विश्वासात घेतलंय ते तुमच्याकडून आधार मिळेल या आशेवर.’’

‘‘तुम्ही सर्व नि:शंक राहा. ही पद्धत आज सर्वमान्य आहे. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण झाला आहे. मी स्वत: यात जातीनं लक्ष घालतोय ना?’’ रोहननं सर्वांना आश्वस्त केलं.

शेवटी एकदाचं डॉक्टरांनी सांगितलं की काजल गरोदर आहे. काजलनं ऑफिसकडून दिर्घ रजा घेतली. घरात बाळ येणार म्हटल्यावर सगळेच हर्षविभोर झाले होते. प्रत्येकजण नव्या बाळाची आपल्या परीनं कल्पना करत होता. आनंद व्यक्त करत होता. काजलला तर कुठं ठेवू अन् कुठे नको असं तिच्या सासूला अन् आईला वाटत होतं.

सध्या सासूनं काजलचा ताबा घेतला होता. त्यामुळे रमणच्या वाट्याला ती कमी येत होती. रमणलाही खूप आनंद झाला होता. त्यांचं स्टेटस बदलणार होतं. तो बाबा व्हायचा होता. तो बाळाच्या जन्माची वाट बघत होता.

सगळं काही सुरळीत चालू होतं. दर चेकअपनंतर डॉक्टर समाधान व्यक्त करत होते. याच काळात रमणला जाणवलं की रोहनच्या फेऱ्या हल्ली वाढल्या आहेत. त्यातून तो डॉक्टर. आईवडिलांना सतत तब्येतीसाठी त्याचीच गरज पडत होती. पण रोहन आला की काजलची जास्त काळजी घेतो असं रमणला वाटे. हल्ली त्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला होता. हे वीर्यदान रोहननंच केलेलं असेल का?

खरंतर असं नसेल. पण रमणला वाटत होतं. त्याच्याकडे पुरावा काहीच नव्हता. पण त्याच्यात असलेल्या दोषामुळेच त्याला असं वाटत होतं.

रोहनला बघितलं की त्याला आपण मूल जन्माला घालायला असमर्थ आहोत ही बोच फराच टोचायची. रोहनचं काजलकडे येणं त्याला मुळीच सहन होत नव्हतं. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती की जे त्याला काजलसाठी करावंसं वाटतं, ते त्यानं करण्याआधीच रोहननं करून टाकलेले असतं. रोहनसकट घरातील सर्व मंडळी जेव्हा गप्पा, हास्य विनोद करत असतात, तेव्हा रमण त्यात सामील होत नाही, हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. काही न काही कारण सांगून तो तिथून निघून जात असे. हळूहळू स्वत:च्या नकळत रमण मिटत गेला. ज्या उत्साहानं बाळाच्या स्वागतासाठी तो आपल्या पापण्यांच्या पायघड्या घालून बसला होता, तो उत्साह ओसरू लागला. एक विचित्र विरक्ती त्याच्या मनात घर करू लागली होती. रमणला वाटे या घरात त्याच्या संसारात तोच ‘नकोसा’ आहे. काजल त्याला बोलावून घ्यायची. जवळ बैस म्हणायची. पण तो तिच्याजवळ जातच नसे.

रोहन अन् काजल एकमेकांशी बोलायची तेही त्याला आवडत नव्हतं. आता तर त्याच्या मनात यायचं की रोहनच जर या बाळाचा पिता असेल तर मी कशाला मधेमधे लुडबुड करू?

या विचारानं मनात मूळ धरलं अन् मग सगळंच बदललं. आता तर तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसातच घालवू लागला. वरचेवर टूरवर जाऊ लागला. काजलला त्याचं दूरदरू राहणं खटकत होतं. गरोदरपणाचे शेवटचे दिवस तर काजलसाठी फारच अवघड होते. तिला उठताबसताना मदत लागायची. सासू मदत करायची. रोहन मदत करायचा पण रमण जवळ येत नव्हता. नवरा बायकोत एक अदृश्य भिंत उभी होती. खरं तर रमणचं लग्न झालं, तेव्हा रोहन लहानच होता. काजलला तो छोटी आई किंवा वहिनी आई म्हणायचा. काजलही त्याचं खूप कौतुक करायची. त्यानं डॉक्टर व्हावं ही तिचीच इच्छा होती. ‘‘शी! हे काहीच्या काहीच झालंय सगळं. यापेक्षा आम्हाला मूल नसतं झालं तरी चाललं असतं.’’ संतापून तो स्वत:शीच पुटपुटला. नको नको ते विचार त्याची बुद्धी भ्रष्ट करत होते. तो धुमसत होता. काय करावं ते सुचत नव्हतं.

तेवढ्यात रोहनची हाक ऐकू आली, ‘‘दादा, लवकर ये वहिनीआईला त्रास होतोय, तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल.’’

‘‘तूच घेऊन जा. मी जाऊन काय करणार? मी काही डॉक्टर नाही, मला आज हैदराबादच्या टूरवर जायचंय…मी निघालो आहे…पंधरा दिवसांनी येईन…’’ रमण अगदी अलिप्तपणे म्हणाला.

काजलचा चेहरा वेदनेनं पिळवटला होता. तरी तिनं स्वत:च्या मनाची समजूत घातली की हा अलिप्तपणा रमणच्या मनातील न्यूनगंडातून आलेला आहे. होणाऱ्या बाळाचा तो जैविक पिता नाही, हे शल्य त्याला बोचतंय. हा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला, तेव्हाच काऊंसिलिंग करणाऱ्या सायकोलॉजिस्ट डॉक्टरनं तिला याबाबतीत सांगून सावध केलं होतं. त्यामुळे तिनं रमणला काहीच म्हटलं नाही.

अकराव्या दिवशी काजल भरल्या ओटीनं परत आली. या अवधीत रमणनं एकदाही, फोनवरसुद्धा तिची चौकशी केली नव्हती. तो पंधराव्या दिवशी परत आला. आईनं म्हटलं, ‘‘तू बाबा झालास…अभिनंदन! काजलला भेट ना, ती वाट बघतेय.’’

तो खोलीत गेला. पाळण्याकडे बघितलंही नाही. काजलला त्याची मन:स्थिती समजत होती. तिनंही त्याच्या वागण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तो आपल्या नेहमीच्या त्याच्या कोपऱ्यातल्या खोलीत गेला आणि त्यानं म्युझिक सुरू केलं. त्याचवेळी त्याच्या कानांवर संगीतापेक्षाही मधुर असा सूर आला…अरे? हा तर बाळाच्या रडण्याचाच आवाज…मुलगा आहे की मुलगी? कुणी त्याला सांगत का नाहीए? अन् बाळाला कुणी गप्प का करत नाहीए? त्याला काहीच समजेना…संगीत बंद केलं अन् बाळाच्या रडण्याचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू आला.

बाळ रडतंय…रमण खोलीत फेऱ्या घालतो आहे. कुणीच नाहीए का बाळापाशी? त्याची आई? आजी? दुसरी आजी? बाळाचा आवाज आता दमल्यासारखा वाटतोय.

तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजू लागला. नंबर नवा वाटला. त्यानं फोन कानाला लावला. ‘‘दादा, मी रोहन बोलतोय, प्लीज सगळं ऐकून घे. फोन बंद करू नकोस. मी ऑस्ट्रेलियात, सिडनीला आलोय. मला इथं एक कोर्स करायचाय. शिवाय जॉबही मिळाला आहे. दादा, तू आणि छोट्या आईनं माझ्यासाठी खूप खूप केलंय. पण दादा, गेले काही महिने छोट्या आईनं खूप मानसिक ताण सोसलाय. तुझा अलिप्तपणा तिला किती छळत होता, त्याची कल्पनाही तुला नाहीए. दादा, तू रागवू नकोस, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण जेव्हा छोट्या आईला तुझी सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हाच तू तिच्यापासून दूर राहिलास,’’ बोलता बोलता रोहन रडायला लागला. रमणच्या मनात आलं किती मोठा झालाय रोहन, केवढी समजूत आहे त्याला. मीच मूर्ख स्वत:च्या कल्पनेतल्या विकृतीत अडकलो.

रमण काही बोलणार, तेवढ्यात रोहन म्हणाला, ‘‘दादा, बाळं रडताहेत का? मला फोनवर त्याच्या रडण्याचा आवाज येतोय…’’

बाळं? म्हणजे जुळी आहेत का? फोन तसाच घेऊन रमण खोलीत धावला. पाळण्यात दोन छोटी छोटी बाळं सर्व शक्ती एकटवून रडत होती.

‘‘रोहन, बाळा, धन्यवाद! फोन करत राहा…अन् लवकर घरी ये…’’ त्यानं फोन बंद केला अन् त्या लहानग्यांना दोन्ही हातांनी उचलून कवटाळून धरलं. त्याच्या मनात आलं, अगदी रोहनच्या स्पर्मपासून जरी ही बाळं झाली असली तरी काय फरक पडतो? आता ही बाळं त्याची आहेत. तो या बाळांचा पिता आहे. मनातून एक समाधान डोकावत होतं…जर रोहन या मुलांचा बाप असता तर तो त्यांना सोडून गेलाच नसता. म्हणजे ही बाळं रोहनची नाहीत. केवळ मोठं समाधान…!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें