सरिता

कथा * देवेंद्र माने

ती माझ्या अगदी समोरून निघून गेली. ही अशी…अन् अगदी अकस्मात! तिने खरं तर मला बघितलंही असावं पण अजिबात न बघितल्यासारखं करून ती निघून गेली. जणू मी कुणी परका, अनोळखी माणूस होतो. जणू आम्ही कधी भेटलोच नव्हतो…पण माझा तिच्यावर कोणताच, कसलाच हक्क नव्हता. मी कसा काय तिला अडवणार होतो? विचारावं वाटलं होतं, कशी आहेस? काय करतेस हल्ली? पण…न जाणो तिला माझं दिसणं हा अपशकून वाटला असेल…मी दिसल्यामुळे उरलेला दिवस वाईट गेला असेल…कशाला हा दिसला असंही वाटलं असेल…

ही तीच मुलगी होती. म्हणजे पूर्वीची मुलगी. आता एक विवाहित स्त्री, कुणाची तरी पत्नी. पण जेव्हा प्रथम मी भेटलो तेव्हा ती एक सुंदर मुलगी होती. माझ्या भेटीसाठी आतुरलेली, मला भेटल्याशिवाय चैन न पडणारी.

आम्ही प्रथम भेटलो तो दिवस मला अजून आठवतो. तिने कॉलेजच्या पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतलं होतं. मी दुसऱ्या वर्षांला होतो. नव्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्याची फार वाईट पद्धत त्या काळात होती. सीनिअर्सने तिला एकटीला गाठलं अन् तिला आय लव्ह यू म्हणायला सांगितलं. तिने नकार दिला. मग तिला बियर प्यायला सांगितलं. तिने पुन्हा नकार दिला. मग म्हणाले, सलवार किंवा  कमीज (टॉप) यापैकी एक काही तरी काढ. तिने मान खाली घालून पुन्हा नकार दिला, मग सीनियर्स संतापले, चेकाळले त्यांनी तिला थोबाडायला सुरूवात केली.

ती जोरजोरात रडायला लागली. एकेक जण यायचा, गालावर मारून जायचा. मी तिच्या जवळ गेलो. ती संताप, लज्जा अन् अपमानाने थरथरत होती. अश्रू ओघळत होते. मी तिच्या समोरून तिला हातही न लावता निघून गेलो. मुलांनी तिचे कपडे फाडायचाही प्रयत्न केला, पण मी काही सज्जन पण दांडगट मित्रांच्या मदतीने त्यांना हुसकून लावलं. ती बेशुद्ध पडली होती. मी तिला इस्पितळात पोहोचवलं. कॉलेजातून तिचा पत्ता, फोन नंबर मिळवून तिच्या घरच्यांना कळवलं.

तिचे वडील शहरातले फार मोठे व्यावसायिक होते. त्यांनी सरळ पोलिसात तक्रार केली. त्यांच्या पोलिसात, राजकारणी लोकात भरपूर ओळखी होत्या. त्यामुळे पोरं घाबरली, सरळ धावत इस्पितळात पोहोचली. वडिलांसमोर मुलीची क्षमा मागितली. चक्क पाय धरले. विषय तिथेच संपला.

तिच्या वडिलांनी माझे आभार मानले. गरिबाचे आभार मानताना त्याला पैसे दिले जातात. ‘प्रेमाने देतोय, नाही म्हणू नकोस’ असं म्हटलं जातं. मला तर पैशांची नितांत गरज होती. मी पैसे घेतले. एक कोट्यधीश व्यावसायिक, समाजात मानसन्मान, राजेशाही बंगला, दारात चमचमत्या चारपाच मोटारी, गेटपाशी वॉचमन. हे सगळं बघून खरं तर मी दबून गेलो. पार बुडालो.

कॉलेजच्या मुलांना ती कोण आहे हे आधी ठाऊक असतं तर हा प्रकार घडलाही नसता. त्यानंतर मात्र सगळेच तिच्याशी व्यवस्थित वागू लागले. पण ती मात्र कुणालाही भाव देत नव्हती फक्त माझ्याशीच बोलायची. सुरुवात तिनेच केली.

‘‘हॅलो, मी सरिता,’’ तिने हात पुढे केला.

‘‘मी देवदत्त,’’ मीही हात पुढे केला.

दोन हात एकमेकांत गुंफले. चार डोळे एकमेकांना भेटले. माझ्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले. हळूहळू आम्ही एकमेकांचे जिवलग झालो. एकमेकांना फोन करत होतो. मेसेजेसची देवाणघेवाण करत होतो. आम्ही प्रेमात सगळं जग विसरलो होतो.

कॉलेजची ट्रिप एका हिलस्टेशला जाणार होती. माझी गरिबी…मी पैसे भरू शकत नाही म्हणून मी ट्रिपला जायला नकार दिला. पण तिने माझे पैसे भरले अन् मला ट्रिपला जावंच लागलं.

तिथल्या रम्य वातावरणात आम्ही दोघंच तळ्याकाठी बसलो असताना तिने म्हटलं, ‘‘मी प्रेम करते तुझ्यावर, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही.’’

‘‘प्रेम मीही करतोय तुझ्यावर…पण याचे परिणाम काय होतील याचा विचार केलाय?’’

‘‘परिणाम काय असणार? सगळ्यांचं जे होतं तेच?’’

‘‘मी फार गरीब आहे.’’

‘‘म्हणून काय झालं?’’

‘‘तुझ्या वडिलांना विचारून बघ…’’

‘‘कमाल करतोस, प्रेम मी केलंय, लग्न मला करायचंय, आयुष्य माझं आहे, मीच ते जगणार आहे तर यात माझ्या वडिलांचा संबंध कुठे येतो?’’

‘‘तेही वडिलांनाच विचार.’’

ती एकदम चिडली. मी तिला समजावलं, तिचा रुसवा काढला. किती प्रयत्न केले तेव्हा ती खळखळून हसली. स्वच्छ खळखळणाऱ्या गंगेप्रमाणे पवित्र भासली ती मला.

त्यानंतर आमचं प्रेम वाढतच गेलं. आमच्या भेटी वाढल्या. सगळ्या कॉलेजात आमच्या प्रेमाचीच चर्चा होती. कित्येक मुलं माझ्यावर जळायची.

‘‘मला तुझ्या घरी घेऊन चल,’’ एक दिवस सरिताने मला म्हटलं, ‘‘तुझ्या घरातल्यांशी माझी ओळख करून दे.’’

मी एकदम घाबरलोच! माझी गरिबी बघून तिला काय वाटेल? ती माझ्यापासून फारकत घेईल का? घरात विधवा आई अन् लग्नाच्या वयाची असूनही केवळ पैसे नाहीत म्हणून लग्न न झालेली बहीण आहे. दोन खोल्यांचं विटामातीचं घर. वैधव्य, गरिबी, हतबलता यामुळे कायम चिडचिड करणारी अन् करवादून बोलणारी आई. तिच्या कष्टामुळे शिकत असलेला मुलगा नोकरी करून पैसा मिळवेल याच एका आशेवर आहे ती अन् मी…? बहिणीच्या लग्नाआधी स्वत:चंच लग्न ठरवलं हे बघून तिला काय वाटेल?

सरिता हटूनच बसली. शेवटी मी तिला घरी आणली. ती आईला भेटली, बहिणीला भेटली. छान बोलली. आईने गोडाचा शिरा केला, बहिणीने चहा केला. निरोप घेऊन सरिता निघून गेली. आई मात्र त्यानंतर गप्प गप्प होती. ती बोलली जरी नाही तरी मला सर्व समजलं. मला लवकरात लवकर नोकरी केली पाहिजे. बहिणीचं लग्न करायचं आहे. माझ्या जबाबदाऱ्या आहेत या, त्यानंतर इतर गोष्टी. मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. पण मला यश येत नव्हतं. सतत नकार मिळाल्याने माझं मन आता अभ्यासासाठी लागत नव्हतं. मला फार असहाय वाटत होतं. एकच उपाय होता, मी सरिताशी लग्न करून घरजावई व्हायचं अन् या गरिबीतून कायमचं मुक्त व्हायचं. पण स्वाभिमान आडवा येत होता.

सरिता कोट्यधीश बापाची एकुलती एक कन्या होती. प्रेमात आकंठ बुडाल्यामुळे ती महालातून झोपडीतही येऊन राहायला तयार होती. ती मला झोपडीतून राजमहालातही घेऊन जायला तयार होती. पण काय करू ते मलाच समजत नव्हतं. एका पवित्र खळाळत्या स्वच्छ नदीला मी माझ्या गरिबीच्या दलदलीत आणून सोडू? ती किती दिवस हे सहन करेल? प्रेमाची धुंदी उतरल्यावर ती माझ्याजवळ या गरिबीत राहू शकेल? पण तिला इतकं करायला लावण्याचा मला काय हक्क आहे? तिच्या घरी जाऊन घरजावई म्हणून राहू? पण स्वाभिमान तसं करू देत नव्हता. आईचा एकमेव आधार मी होतो. आईला काय वाटेल?

‘‘तुझी अडचण काय आहे?’’ सरिताने विचारलं.

‘‘मला दोन्ही चालणार आहे. एक तर तू तुझ्या गरिबीतून बाहेर पड, नाहीतर मला येऊ दे तुझ्या घरात. मला फक्त तू, तुझी सोबत हवीय. गरीब, श्रीमंत, महाल, झोपडी, कशानेच फरक पडणार नाही. तू तिथे मी. तुझ्याशिवाय मला महालात स्वास्थ्य नाही.’’

मी गप्प होतो.

‘‘तू बोलत का नाही?’’ वैतागून तिने विचारलं.

‘‘काय बोलू? मला थोडा वेळ दे…’’

वेळ तर झपाट्याने पुढे जात होता. कॉलेज संपलं. मी नोकरी शोधत होतो. मला कुठेही, कसलीही नोकरी मिळेना. सरिता भेटायची, फोनवर बोलायची. मी खरं तर पार मोडून पडलो होतो. अन् सरिताने लग्नाचा धोशा लावला होता. तिच्या प्रेमाचा हक्कच होता तो.

सरिताचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिने तिच्या वडिलांशी माझ्या बाबतीत बोलून ठेवलं. मला म्हणाली, ‘‘बाबांनी घरी बोलावलंय. त्यांना काही बोलायचं आहे.’’

मी त्या अवाढव्य बंगल्यापुढे उभा होतो. आत दांडगी अल्सेशियन कुत्री भुंकत होती. मला बघून दरवानाने दार उघडलं.

बाहेरच्या हिरवळीवरच सरिताचे बाबा चहा घेत होते. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी बसण्याची खूण केली. तेवढ्यात नोकर माझ्यासाठी चहा घेऊन आला. मी भेदरून बसलो होतो. आपण किती खुजे आहोत या जाणीवेने मी खूपच नव्हर्स झालो होतो.

त्यांनी दमदार आवाजात विचारलं, ‘‘काय हवंय?’’

‘‘नाही…काहीच नाही,’’ मी कसाबसा बोललो.

‘‘सरिताशी लग्न करण्याची हिंमत आहे?’’

‘‘न…नाही.’’

‘‘घरजावई व्हायची तयारी आहे?’’

‘‘नाही….’’

‘‘मग पुढे काय ठरवलंय?’’

मी गप्प.

‘‘लग्न तू करू शकत नाहीस. तुला नोकरीही मिळत नाही. गरीब घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आयुष्य संपेल तुझं. माझ्या पोरीचं कसं व्हायचं? तू तिला नाही म्हण…उगाचच वेळ घालवून तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नकोस.’’

मी गप्पच होतो. काय बोलणार?

‘‘तू तर तुझा आत्मविश्वासही घालवून बसला आहेस. हे बघ देव, एक तडजोड सुचवतो. वाटल्यास त्याला सौदा म्हणूयात.’’

मी मान खाली घालून बसलो होतो. त्यांच्याकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं.

‘‘माझ्या मित्राच्या कंपनीत तुला सुपरवायझर म्हणून नोकरी देतो. बहिणीच्या लग्नासाठी बिनव्याजी कर्जही देतो. पगार भरपूर आहे. तझ्या आईला बरं वाटेल. तिचे पांग फेडल्यासारखं होईल. फक्त तुला सरितापासून दूर व्हावं लागेल.’’

मला नोकरी लागली. बहिणीच्या लग्नासाठी पैसेदेखील मिळाले. म्हातारी, कातावलेली, थकलेली आई जरा हसऱ्या चेहऱ्याने बोलू लागली.

सरिताला त्यानंतर मी भेटलो नाही. काही दिवस माझी बदली दुसऱ्या शहरात झाल्याने सरिताशी संपर्कच झाला नाही. वडिलांनी तिला सांगितलं की त्याने जबाबदारी अन् प्रेम यापैकी जबाबदारीला अधिक महत्त्व दिलं. त्याला घरजावई म्हणून राहायचं नव्हतं. तेव्हा तू त्याला विसर.

आज इतक्या वर्षांनंतर सरिता अशी जवळून निघून गेली, पुसटशी ओळखही तिने दाखवली नाही तेव्हा मी जबाबदाऱ्यांची काय किंमत दिलीय हे मला जाणवलं.

तिच्या मागेच माझा कॉलेजचा मित्र दिसला. रॅगिंग मास्टर समर खोत. ‘‘अरे देव, कसा आहेस?’’

‘‘मी बराय, तू सांग.’’

‘‘माझं छान चाललंय…मजेत आहे मी…’’

‘‘अरे मी कुणा कपाडिया, एस. नामक व्यक्तिला भेटायला आलोय.’’

तो मनमोकळे हसला. ‘‘अरे मीच कपाडिया एस. समर कपाडिया. मीच बोलावलंय तुला.’’

मी चकित! ‘‘कसं शक्य आहे? तू तर समर खोत आहेस. फिरकी घेतोस काय?’’

त्याने मला कॉफी घ्यायला चल म्हटलं. मी एजंट होतो. तो माझा क्लायंट होता. त्याच्याबरोबर जाणं क्रमप्राप्त होतं.

समरने कॉफी मागवली. मग मी फॉर्म काढले. त्याला विचारून फॉर्म भरू लागलो. नॉमिनेशनमध्ये सरिता कपाडिया नाव आलं अन् माझा हात थबकला.

‘‘माझ्या हातावर थोपटत समरने म्हटलं, ‘‘तू नकार दिल्यामुळे सरिता पार बावरली होती. सैरभैर झाली होती. कापलेल्या पतंगासारखी अवस्था झाली होती तिची. मीही मध्यमवर्गीयच होतो. मला थाटामाटाचं, श्रीमंती आयुष्य जगायचं होतं. असं समज, तो कापलेला पतंग मी लुटला. मी तिच्या वडिलांना भेटलो. घरजावई व्हायला तयार झालो. सरिताला प्रेमाने बोलून, समजावून नव्याने आयुष्य जगायला उद्युक्त केलं. तिने सावरावं म्हणून अतोनात प्रयत्न केलेत. खरं तर मीही तिच्यावर प्रेम करत होतो. पण ती तुझ्या प्रेमात असल्याने मी गप्प होतो. माझं प्रेम, माझे कष्ट यामुळे ती सावरली. तिच्या वडिलांची अट मान्य करून मी आडनाव अन् जातही बदलली. तिला प्रेमाने जिंकलंच, तिच्या वडिलांची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकाप्रमाणे मानून त्यांनाही जिंकलं. आज माझ्याजवळ सरिता आहे. मानसन्मान, पैसाअडका सगळंच आहे. मीच कपाडिया शेठ.’’

तेवढ्यात सरिता तिथे आली. मला बघून म्हणाली, ‘‘हे इथे कसे?’’

‘‘बऱ्याच दिवसांपासून पॉलिसी घ्यायला फोन करत होता. मी ओळखलं त्याला, पण त्याने मला ओळखलं नाही.’’

सरिता म्हणाली, ‘‘कसे ओळखणार? तुम्ही तर आडनाव, जात सगळंच बदललं. प्रेमात जात, धर्म काहीच आडवं येत नाही…’’

समर हसला. त्याने सरिताने मारलेला टोमणा सहज पचवला.

‘‘देव, घरी सगळे कसे आहेत?’’

‘‘आई मागेच वारली.’’

‘‘तुझी बायको, मुलं?’’

‘‘लग्न नाही केलं मी. बहीण विधवा होऊन दोन मुलांसकट माहेरी परत आली. आता त्यांचंच सगळं करतो आहे. सुपरवायझरची नोकरी सोडून दिली; कारण ती उपकाराच्या ओझ्याखाली काम करण्याची जाणीव देत होती. आता विमा एजंट झालोय. दिवसरात्र तुझ्यासारखे कस्टमर क्लायंट शोधत असतो.’’

‘‘जी माणसं आयुष्यात योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, मोठे निर्णय घेताना कचरतात त्यांचं आयुष्य असंच जायचं,’’ सरिताने म्हटलं. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

जुनं प्रेम पुन्हा उफाळून येऊ नये म्हणून समरने घाई केली. ‘‘चल सरिता, आपल्याला निघायला हवं. देव, उद्या भेटतो तुला. हे काम तुझं झालं म्हणून समज.’’ अन् तो सरितासोबत निघून गेला.

घरजावई न होण्याचा स्वाभिमान दाखवून मी काय मिळवलं? जे मिळवलं त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक घालवलं. सरिता शेवटी सागराला मिळाली. वर वर ती सुखी दिसली तरी ती तृप्त नाही हे मला कळत होतं. केवळ माझ्यामुळे ती दु:खी आहे ही सल माझ्या मनात नेहमीच राहील.

पेरले तेच उगवले

कथा * डॉ. नीहारिका

‘‘तू जेव्हा किंचाळतेस ना त्यावेळी अगदी जंगली मांजरीसारखी दिसतेस. केस थोडे अजून पिंजारून घे.’’ सौम्य दातओठ खात ओरडला.

‘‘अन् तू? थोबाड बघितलंस कधी आरशात? ओरडून ओरडून बोलतोस तेव्हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दिसतोस.’’

मी आणि सौम्य अगदी खालच्या पातळीवर येऊन भांडतो तेव्हा आपण सभ्य आहोत, चांगल्या वस्तीत राहातो वगैरे गोष्टींना अर्थ उरत नाही. फक्त आमचा मुलगा क्रिकेट खेळायला किंवा अभ्यासाला केव्हा बाहेर पडतो याचीच आम्ही वाट बघत असतो. पूर्वी आमच्यापैकी कुणी एक रेडिओ किंवा टीव्ही किंवा रेकॉर्डप्लेअर ऑन करत असे. हेतू हा की भांडणाचा आवाज आसपासच्या घरात ऐकू जाऊ नये. पण आता तर आम्ही त्या आवाजाच्या वरचढ आवाजात भांडतो. लोकांना पूर्वी आम्ही आदर्श नवराबायको वाटत असू पण आता मात्र त्यांच्या नजरेत उपहास दिसतो.

आमचा प्रेमविवाह. मी अठरा वर्षांची होते अन् सौम्य छत्तीसचा. त्यांची बायको एका अपघातात निवर्तली होती. त्यांची दोन्ही मुलं आजोळी होती अन् सौम्य अगदी उमदेपणाने, मजेत आयुष्य जगत होता. त्यांच्यात काय नव्हतं? हसरा, देखणा चेहरा, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा, शायरी, नाटक, कविता, सिनेमाची आवड, बेभानपणे मोटरसायकल चालवणं…माझं अल्लड वय, स्वप्नाळूवृत्ती अन् सिनेमाची आवड, सिनेमातलं जग खरं मानून चालण्याचा भाबडेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या प्रेमात पाडायला पुरेशा होत्या. मी पूर्णपणे सौम्यमय झाले होते. त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचत नव्हतं. त्याचं वागणं, बोलणं नाटकी, बेगडी आहे हे मला कबूलच नव्हतं. त्याच्यासारखा दुसरा कुणी असूच शकत नाही अन् तो प्रेम करतोय माझ्यावर हा माझा फार मोठा सन्मान आहे हेच मला खरं वाटत होतं.

आईबाबांना सौम्य अजिबात आवडला नव्हता. ‘‘छत्तीस वर्षांचं वय आहे. या वयाला चांगली नोकरी, जबाबदार वागणूक, समाजात आदरसन्मान मिळवतो माणूस. हा तर इतका थिल्लर वागतो. नातेवाईकही त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. तो तुला काय सांभाळणार आहे? सगळं आयुष्य कसं काढशील त्याच्याबरोबर?’’ आई वेगवेगळ्या पद्धतीने मला समजावत होती.

मीच उलट म्हणायची, ‘‘तो चांगला हसतो, हसवतो यात वाईट काय आहे? उलट कौतुक केलं पाहिजे. किती बेदरकारपणे आयुष्य जगतोए तो…’’

वडील फार अपसेट होते. दिवसदिवस वाचलेल्या पेपरमध्ये काय बघत बसायचे कुणास ठाऊक.

मी, आई, दोघं धाकटे भाऊ गप्प होतो. बाबांना प्रचंड टेन्शन आलं होतं.

‘‘शालिनी…’’ बाबांनी हाक मारली.

नेहमीची शालू हाक नव्हती. याचा अर्थ त्यांना खूपच हाय टेन्शन आलेलं आहे.

‘‘शालिनी इथे बैस. माझं बोलणं नीट ऐकून घे. मी काय म्हणतो ते समजून घे. मी चौकशी केली आहे. सौम्य चांगला मुलगा नाहीए. त्याच्या पहिल्या बायकोने याच्या बेताल वागण्यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या केली. दोन्ही मुलं आजोळी पोहोचवून हा इथे उनाडतोय. त्यांची काळजी घेत नाही, पैसे पाठवत नाही. गुंड मित्रांकरवी सासूसासऱ्यांना धमकी दिलीय, तोंड उघडलं, पोलिसात गेलात तर घरात चौघांचे मुडदे पडतील म्हणून. घाबरून आपली नातवंडं अन् स्वत:च्या जिवाच्या भीतीने ते लोक गप्प बसलेत.

‘‘असा निष्ठूर अन् बेजबाबदार पुरुष तुला कसा अन् काय सुख देणार? कमवत नाही, मुजोर आहे. पुन्हा तुझ्या अन् त्याच्या वयात अंतर किती जास्त आहे. जोडीदार इतका मोठा नसावा. शांतपणे विचार कर. प्रेम करणं चांगलं, पण ते डोळसपणे करावं. आंधळं प्रेम काय कामाचं? तुला चांगल्या शाळेत घातलं. चांगले संस्कार दिले अन् तू अशी विवेक सोडून का वागते आहेस? नीट विचार कर, एकदा नाही दहादा विचार कर अन् मग निर्णय घे.’’

खरं तर बाबा अत्यंत धीराचे. ठामपणे बोलणारे, दृढपणे वागणारे. पण मला समजावताना भावनाविवश झाले होते. त्यांची हतबलता बघून मी अधिकच उद्धट अन् उद्दाम झाले होते. मी क्षणाचाही विचार न करता ओरडून बोलले.

‘‘माझा निर्णय झालाय, बाबा. एकदा, दहादा, शंभरदा विचार केला तरी मी लग्न सौम्यबरोबरच करणार आहे. तुम्ही होकार दिलात तरीही अन् नकार दिला तरीही…’’ मी खरं तर मर्यादेच्या बाहेर गेले होते, पण विवेकच नव्हता तर काय करणार?

‘‘ठीक आहे. तर मग माझाही निर्णय ऐकून घे. आजपासून तुझा अन् आमचाही काही संबंध नाही. मी, आई, दोघं भाऊ तुझे कुणीही नाही. मी मरेन तेव्हा संपत्तीतला तुझा वाटा घ्यायला फक्त ये. नाऊ गेट लॉस्ट!’’ बाबा नेहमीसारखेच खंबीर झाले होते.

मी तरी कुठे घाबरले होते? मीही म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुमची संपत्ती नकोय मला, मी कधीही इकडे फिरकणार नाही. बाय…’’ धाडकन् दरवाजा आपटून मी घराबाहेर पडले.

त्याच रात्री एका देवळात आम्ही लग्न केलं. सौम्यचे चार मित्र फक्त होते. माझं नाव सौम्यने शालिनीऐवजी सौम्या केलं. मिसेस सौम्या सांगताना मला स्वत:चाच अभिमान वाटत होता.

लग्नानंतरचे काही दिवस खूपच छान होते. अगदी सिनेमांत दाखवतात तसे किंवा कथाकादंबरीत वर्णन असतं तसे…प्रेमाचे, सुखाचे, लवकरच बाळाच्या येण्याची चाहूल लागली. माझ्यासाठी ती एक अद्भूत घटना होती. आई होण्याच्या कल्पनेनेच मी मोहरले, पण सौम्याला दोन मुलं आधीची होती. त्याला या प्रसंगाची अपूर्वाईच नव्हती. अजिबात उत्साह नव्हता. मीही या गोष्टीकडे समजुतीनेच बघत होते. मुळात मी समजूतदारच होते. पुरुषाचं, त्यातून दोन मुलं असलेल्या बापाचं मानसशास्त्र वेगळं…माझ्यासारख्या अल्लड तरुणीचं मानसशास्त्र वेगळं. त्यामुळे मी आई होण्याच्या माझ्या आनंदात कुठेही कमतरता केली नाही. पूर्ण उत्साहाने मी माझं गरोदरपण एन्जॉय केलं.

दिवस भरल्यावर बाळ जन्माला आलं. कळा सोसताना ब्रह्मांड आठवलं. आईशी संबंध तुटला होता पण त्या क्षणी सौम्यने आपल्याजवळ असावं असं फार वाटत होतं. माझी काळजी न करता तो इस्पितळातल्या लेडी स्टाफशी हास्यविनोद करण्यात गुंतला होता. त्याच्या या दिलखुलास वागण्यावरच तर मी भाळले होते. तक्रार कुणाजवळ अन् काय करणार?

आईपणाच्या जबाबदारीत मी पूर्णपणे गुरफटले होते अन् सौम्य मात्र मोलकरीण, मला अन् बाळाला तेलपाणी करणारी बाई, मला भेटायला येणाऱ्या शेजारणी किंवा माझ्या मैत्रिणींना हास्यविनोदात चिंब भिजवण्यात गर्क होता. त्याचा हा जिव्हाळा माझ्या बाळापर्यंत मात्र पोहोचत नव्हता. माझं बाळ म्हणायचं एवढ्यासाठी की सौम्यने आधीच सांगितलं होतं, हे बाळ फक्त तुझं अन् तुझंच आहे. माझी आधीची दोन मुलं आहेत. बिचारी आजोळीच आयुष्य कंठताहेत.

सौम्यचं हे सरड्याप्रमाणे रंग बदलणं बघून मी चकित झाले. आमच्या प्रेमात असण्याच्या दिवसांत त्याने चुकूनही कधी बायकोमुलांचा उल्लेख केला नव्हता. आताच त्याला त्या बिचाऱ्या, आईवेगळ्या पोरांची आठवण येत होती. इथूनच माझ्या प्रेमाच्या आरशाला तडा गेला होता.. दिवसेंदिवस नवेनवे तडे वाढतच होते. ज्या दिवशी मी त्याला त्याच्या मित्राशी बोलताना ऐकलं, ‘‘ही मूर्ख बाई आपल्या बापाची सगळी इस्टेट सोडून रिकाम्या हाताने माझ्या पैशांवर मजा मारायला आली आहे,’’ त्या दिवशीच प्रेमाच्या दर्पणाचा चक्काचूर झाला. सौम्य सांगत होता, ‘‘हिचं रूप अन् तारुण्य याचा मोह पडला मला. अन् मी लग्न करण्याचा मूर्खपणा करून बसलो, एरवी अशा अनेक पोरींना फिरवून, वापरून सोडून दिलंय मी.’’

त्यानंतर आमच्यात फक्त भांडणं अन् भांडणंच होती. घर सोडलं नाही मी पण माझ्यासाठी अन् माझ्या बाळासाठी एक साधीशी नोकरी करून आमच्यापुरतं कमवत होते. लग्नाला आठ वर्षं झाली होती.

गर्भाशयाला कॅन्सरचा धोका असल्याचं निदान झालं अन् ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला गेला. गर्भाशय काढण्याचं मेजर ऑपरेशन…जवळ कोणीही नाही जो आधार देईल, धीर देईल. माझा सात वर्षांचा मुलगा माझा हात घट्ट धरून बसला आहे. माझे अन् त्याचेही हात घामेजले आहेत. त्याच्या गोड, कोवळ्या चेहऱ्यावर भीती दाटून आली आहे. आईला काय झालंय? त्याला कळत नाहीए. वडील कधीच त्याचे नव्हते. माझ्या मनात येतंय, माझं बरंवाईट झालं तर माझ्या बाळाला कोण बघणार? सौम्यच्या आधीच्या बायकोला निदान माहेर होतं. ती मुलं आपल्या आजोळी आहेत. माझ्या बाळाला तर तेही नाही. कुठे जाईल तो? काय करेल?

नर्स, वॉर्डबॉय सगळ्यांची धावपळ सुरू आहे. ऑपरेशनच्या आधीची ही सगळी लगबग बघून मीही खूप घाबरले आहे. सौम्यने यावेळी येऊन धीर द्यावा असं फार वाटतंय. पण तो बाहेर नर्सेसबरोबर थट्टा, विनोद करतोय. त्याचा आवाज इथपर्यंत येतोय.

‘‘मॅडम, मला हे सगळं बघवत नाही. मी तर ऑपरेशनच्या नावानेच घाबरतो. पण तुम्ही सगळ्या हुशार अन् देखण्या पऱ्या इथे आहात म्हणून बरंय, नाही तर या नरकात माझा जीवच गेला असता.’’

मी खोलीच्या दाराकडे बघत होते. स्टे्रचर घेऊन नर्स व वॉर्डबॉय आले. पण सौम्य नाही. बाळाने माझा हात सोडला अन् मला मिठी मारली. तो गदगदून रडू लागला.

‘‘बाळा, रडू नकोस. तू तर शूरवीर आहेस. शूर शिपाई आहेस. मला काही झालं नाहीए. बघ, मी पटकन् बरी होऊन येतेय…’’ मी त्याला थोपटत धीर दिला.

‘‘चला, चला, घाई करा मॅडम, उशीर होतोय. डॉक्टर आम्हाला ओरडतील,’’ सिस्टर म्हणाली.

मी स्ट्रेचरवर आडवी झाली. ‘‘चला,’’ मी म्हटलं. ‘‘का हो, माझे मिस्टर कुठे आहेत?’’ माझ्या प्रश्नाला उत्तर वॉर्डबॉयने दिलं.

‘‘ते आम्हा सगळ्या स्टाफसाठी मिठाई घ्यायला गेलेत. म्हणत होते, आज त्यांचा मुक्ती दिवस आहे. येतील एवढ्यात.’’

स्टे्रचर ढकलत त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं. तिथे आले अन् माझं अवसानच संपलं. एका अनामिक भीतीने मनात ठाण मांडलं. भीतीची शिरशिरी थेट मनात शिरली. पांढऱ्या टोप्या अन् अॅप्रन…हातात रबरी मोजे. चेहरे कुणाचेच दिसत नाहीएत. ते डोळे फक्त बघताहेत माझ्याकडे. काय बघतात? माझी असहायता? माझा मूर्खपणा? माझा आजार?  ते माझा आजार दूर करतील की माझं अस्तित्वच मिटवून टाकतील? मला एकाएकी आई, बाबा, दोघां भावांची फार फार आठवण आली.

तेवढ्यात मला अंधुकसा चेहरा दिसला, सौम्यचा. एका नर्सच्या खांद्यावर हात ठेवलेला होता. त्याचा आवाज मात्र माझ्या कानात शिरला. ‘‘अरे, युटरस काढायचंय…युटरस नाही म्हटल्यावर बाईचं बाईपणच संपलं ना? बायको काय कामाची मग? म्हणजे मी मुक्त झालो…स्वतंत्र झालो…तसा मी बंधमुक्त…मला बंधनं आवडत नाही. मी आज या झाडावर तर उद्या दुसऱ्या झाडावर…मी स्वतंत्र…मी मुक्त हा:हा:हा:’’

आई, बाबा, मला क्षमा करा. तुम्ही मला शिकवलंत, संस्कार दिलेत पण मीच कमी पडले. मी बाभळीचं रोप लावलं, त्याला फळं कशी येणार? मी जे पेरलं तेच उगवलंय…मला क्षमा करा…

दुरून कुठून तरी अस्पष्ट ऐकलं मी. ‘‘डॉक्टर, डॉक्टर बघा, पेशंट बेशुद्ध होतेय…अजून क्लोरोफॉर्म दिलाच नाही…बी.पी. लो, खूपच लो झालंय…डॉक्टर हरी अप.’’

अन् पलीकडे अंधार…दाट अंधार पसरला.

तूच माझा जीवनसाथी

कथा * मिनू शहाणे

मला वाटत होतं की नीरज समोरच्या खिडकीतल्या त्याच्या त्या ठराविक जागी उभा आहे. आता तो हात हलवून माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेईल. तेवढ्यात मागून माझ्या खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श झाला तशी मी दचकले.

‘‘वन्स, तुम्ही इथं काय करताय? सगळे लोक ब्रेकफास्टसाठी तुमची वाट बघताहेत…आणि जावईबापूंची नजर तर तुम्हालाच शोधते आहे,’’ वहिनीनं माझी चेष्टा करत म्हटलं.

सगळेच आनंदात हसत बोलत ब्रेकफास्ट घेत होते. पण मला मात्र काहीच आवडत नव्हतं. मी उगीच काही तरी चिवडत बसले होते.

‘‘मेघा, अगं तू काहीच खात नाहीएस? सूनबाई अगं, मेघाला गरम पुरी वाढ बरं?’’ आईनं वहिनीला हुकूमच दिला.

‘‘नको, मला काहीच नकोय. झालंय माझं.’’ मी ताडकन् उठले.

प्रदीप दादा माझ्याकडे रोखून बघत होता. मलाही त्याचा खूप राग आला होता. माझा आनंद हिरावून घेण्याचा त्याला काय अधिकार होता? पण यावेळी गप्प बसणंच श्रेयस्कर होतं. आईबाबांनाही बहुधा माझ्या मन:स्थितीची कल्पना आली होती. माझं नीरजवर खूप खूप प्रेम होतं. त्याच्याशी लग्न करून संसार थाटायची स्वप्नं मी बघत होते. पण या सगळ्यांशी मिळून माझं लग्न अशा माणसाशी लावून दिलं, ज्याला मी कधी पूर्वी बघितलंही नव्हतं अन् ओळखतही नव्हते.

‘‘आई, मी माझ्या खोलीत पडतेय थोडा वेळ.’’ मी आईला म्हटलं अन् जाण्यासाठी वळले, तेवढ्यात आई म्हणाली, ‘‘मेघा, ज्यूस घेतेस का? काहीच खाल्लं नाहीएस तू…’’

‘‘नको, मला भूक नाहीए…’’ मी रागानं म्हणाले.

‘‘मेघा, सासरची माणसं कशी आहेत? तुला आवडतंय ना तिथं? आणि सार्थक, आमचे जावई? प्रेम करतात ना तुझ्यावर?’’

‘‘सगळं ठीकच आहे…’’ मी कोरडेपणाने उत्तरले. मनात तर इतका राग होता की म्हणावसं वाटलं, ‘तुमच्यापेक्षा खूपच चांगली माणसं आहेत ती.’

पुन्हा आईनं म्हटलं, ‘‘पोरी आता हेच तुझं घर आहे. सगळ्यांची मनं जिंकून घे, मिळून मिसळून रहा.’’

‘‘मायलेकींचं काय गूज चाललंय?’’ अचानक सार्थकनं तिथं येऊन विचारलं.

‘‘काही नाही. मी हिला सांगत होते की आता हेच तुझं घर आहे. सगळ्यांना समजून घे. प्रेमानं राहा.’’

‘‘आई, तुमची मुलगी खूप गुणी आहे. इतक्या थोडक्या काळातच तिनं सर्वांना जिंकून घेतलंय.’’ सार्थक माझ्याकडे बघत आईला म्हणाले.

माझ्या लग्नाला अजून तीन महिनेच होताहेत. लग्नानंतर प्रथमच मी आईकडे माहेरी आले होते. आम्ही दोघंही आल्यामुळे घरात सर्वांना खूप आनंद झाला होता. पण माझी दृष्टी मात्र माझं प्रेम शोधण्यातच गुंतली.

रात्री खोलीत आम्ही दोघंच असताना सार्थकनं म्हटलं, ‘‘मेघा, काय झालंय? खूप बेचैन वाटते आहेस? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. इथं आल्यापासून अगदी उदास आणि गप्प का आहेस?’’

‘‘नाही, तसं काहीच नाहीए.’’ मी कोरडेपणानं म्हटलं. सार्थक मला अजिबात आवडत नाहीत. माझ्यासाठी हे अगदी लादलेलं नातं आहे. अगदी नाइलाजानं मला स्वीकारावं लागलेलं. मला ते तोडता येत नाही म्हणूनच ते टिकवावं लागलंय.

‘‘बरं, तर मग प्रॉब्लेम नाहीए असं समजू?’’ सार्थक सौम्य स्वरात अन् प्रेमानं बोलतात.

‘‘डोकं दुखतंय माझं, मी झोपते,’’ मी कूस वळवून डोळ्यांवर हात आडवा घेतला.

मला झोप लागली अन् रात्री तीनच्या सुमारास अवचित जागी झाले. मग मात्र झोप येईना. जुन्या आठवणी मात्र उफाळून आल्या…

आमच्या घरात मी अन् माझे बाबाच सर्वात आधी उठायचो. बाबांना सकाळी सहालाच घर सोडावं लागायचं. मीच त्यांचा चहा, टिफिन अन् नाश्ता बनवत असे. बाकी मंडळी उशीरा उठायची.

बाबा रेल्वेत असल्यामुळे आम्हाला रेल्वेचं क्वार्टर होतं. घरं लहान पण चांगली असायची. मागेपुढे प्रशस्त अंगण असायचं. आम्ही बाहेर छानसं लॉन अन् थोडी बागही केली होती. सायंकाळी खुर्च्या टाकून तिथं बसायला फार छान वाटायचं.

समोरच माझ्या मैत्रिणीचं, नम्रताचं घर होतं. तिचेही वडिल रेल्वेतच होते, पण माझ्या बाबांसारखी त्यांची पोस्ट मोठी नव्हती. मी अन् नम्रता चांगल्या मैत्रिणी होतो. एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकत होतो. एकमेकींच्या घरी बिनदिक्कत जात येत होतो. एकदा बाहेर उभ्या राहून आम्ही दोघी बोलत असताना माझी नजर सहज तिच्या घराच्या खिडकीकडे गेली. तिथं नम्रताचा मोठा भाऊ नीरज उभा होता अन् अगदी टक लावून माझ्याकडेच बघत होता. मला खूपच विचित्र वाटलं. नीरजही गडबडला. मी आपल्या घरात आले पण पुन्हा:पुन्हा मला एकच प्रश्न छळत होता की नीरज माझ्याकडे असा का बघत होता.

नंतर माझ्या लक्षात आलं की तो नेहमीच माझ्याकडे बघत असतो. त्याला बघितलं की माझ्या छातीत धडधड वाढायची. बहुधा तो माझ्या प्रेमात पडला होता…आणि मी ही त्याच्या…आम्ही एकमेकांकडे बघायचो. आमचे डोळे सांगायचे आम्ही प्रेमात पडलोय. आता नकळत मी त्या खिडकीशी जाऊन उभी रहायचे. नीरजचा गोरा रंग अन् घारे डोळे मला फार आवडायचे. आता आम्ही चोरून भेटायलाही लागलो होतो.

सकाळी पुन्हा मी त्याच खिडकीशी जाऊन बसले होते. खांद्यावर कुणीतरी हात ठेवला अन् मी दचकले. वळून बघितलं तर आई होती.

‘‘मेघा, इथं कधीपासून बसली आहेस? चल, चहा करूयात.’’ आईनं म्हटलं.

‘‘मी इथंच बसते गं, तू जा…मी येते थोड्या वेळानं,’’ मी म्हणाले.

आईनं माझ्याकडे रोखून बघितलं. ‘‘तू अजूनही त्या लफंग्याला विसरली नाहीएस? अगं एक दु:स्वप्न म्हणून विसरून जा ना? त्यातच सगळ्यांचं भलं आहे. अगं, आता लग्न झालंय तुझं. आपला संसार सांभाळ, नवऱ्यावर प्रेम कर, इतकं चांगलं सासर अन् असा छान नवरा मिळायलाही भाग्य लागतं. सर्वच मुलींना ते मिळत नाही.’’ आई अगदी रागानं पण कळकळून बोलत होती.

मला रडायलाच आलं. माझी चूक काय होती तर मी प्रेम केलं होतं. प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीए आणि ज्या माणसावर माझं प्रेम नाहीए तो माणूस फक्त माझा नवरा झाला म्हणून त्याच्यावर प्रेम करायचं? कसं शक्य आहे?

‘‘आता आणि रडतेस कशाला? तुझ्या प्रेमप्रकरणाबद्दल जावई बापूंना समजलं तर केवढा अनर्थ होईल, कळतंय का? मूर्ख मुलगी, का आपलं आयुष्य असं नासवायला निघाली आहेस?’’ आईला आता संताप अनावर झाला होता.

‘‘कोण काय नासवतंय आई?’’ सार्थकनं अचानक आत येऊन विचारलं. आमचं बोलणं त्यांनी ऐकलं होतं की काय कुणास ठाऊक.

आई एकदम दचकली…गडबडलीच! ‘‘काही नाही हो, मी मेघाला समजावते आहे की लग्नानंतर नव्या संसारात जास्त रमावं. जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी काढून रडत बसते…ते बरोबर नाही ना?’’ आईनं सारवासारव केली.

‘‘पण आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना विसरायची गरजच नाहीए. मलाही माझ्या कॉलेजातले मित्र अजून आठवतात. कधी तरी भेटतोही आम्ही.’’ सार्थक अगदी सहज बोलत होते. ‘‘मेघा, अगं जग हल्ली खूप जवळ आलंय. इंटरनेटच्या माध्यमातून तू कुणालाही भेटू शकशील.’’

आईच्या घरी आम्ही तीनचार दिवस राहून परत आपल्या घरी रांचीला निघालो. पटना ते रांची सुमार एक दिवसाचा प्रवास आहे. रात्रीची गाडी होती. सार्थकला झोप लागली होती. मी मात्र झोपू शकत नव्हते. माझ्या कुंटुबीयांनी आमचं प्रेम कसं चिरडून टाकलं तेच मला आठवत होतं…पुन्हा पुन्हा…

प्रदीपदादानंच आमच्या प्रेमात बिब्बा घातला होता. माझ्या समोरच त्यानं नीरजला केवढं मारलं होतं. नीरजची आई धावत आली. तिनं हात जोडले, प्रदीपदादाच्या पाया पडून विनवलं. म्हणून त्यांनी नीरजला सोडलं. नाहीतर त्या दिवशी त्यानं नीरजचा जीवच घेतला असता. त्या दिवसानंतर मी व नीरज कधी भेटलोही नाही.

प्रदीपदादानं तर त्याच्या घरच्यांना ताकीद दिली होती की पुन्हा हा इथं दिसला तर मारून अशा ठिकाणी फेकेन की प्रेतही सापडणार नाही. छोट्या पोस्टवर नोकरी करणारे त्याचे वडिल घाबरले. ते कुटुंब आमचं गाव सोडून कुठं तरी निघून गेले. मला काही कळलंच नाही.

नम्रताला आमच्या प्रेमाची कल्पना होती. मी अभ्यासाच्या निमित्तानं रोजच तिच्या घरी जायचे. रोजच नीरजलाही भेटत होते.

एकदा मी त्यांच्या घरी गेलेली असताना नीरज एकटाच घरी होता. नम्रता आणि आई कुठंतरी बाहेर गेलेल्या होत्या. मी परतणार तेवढ्यात नीरजनं माझा हात धरला…मला जवळ ओढलं.

‘‘नीरज, सोड मला…कुणी बघेल…’’ मी घाबरून म्हणाले.

‘‘कोणी बघणार नाही, घरात कुणीच नाहीए.’’ तो म्हणाला. माझ्या छातीत खूप धडधडू लागलं. त्यानं मला जवळ खेचलं. मी सुटायचा प्रयत्न करत होते. पण मला त्याचा स्पर्श आवडत होता…मी डोळे मिटून घेतले…अन् नीरजनं माद्ब्रया ओठांवर ओठ टेकवले.

‘‘अरे हे काय केलंस? हे बरोबर नाही,’’ मी घाबरले होते.

‘‘काय चूक आहे? आपण प्रेम करतोय ना एकमेकांवर?’’ त्यानं माझ्या दोन्ही गालांचं चुंबन घेतलं.

आमचं प्रेम कुणालाच ठाऊक नव्हतं. फक्त नम्रताला ठाऊक होतं. सोनेरी स्वप्नासारखे दिवस होते ते. अशी तीन वर्षं गेली. नीरजला नोकरी लागली. मी ग्रॅज्युएट झाले. आता आम्ही लग्नाची स्वप्नं बघत होतो.

एक दिवस मी नीरजला म्हटलं, ‘‘मला भीती वाटते, माझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत.’’

‘‘तर मग आपण पळून जाऊन लग्न करूयात. तेही नाही जमलं तर एकत्र जीव देऊ. देशील ना मला साथ?’’

‘‘होय नीरज, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही.’’ त्याच्या खांद्यांवर डोकं टेकवून मी म्हणाले.

प्रदीपदादानं आम्हाला एकत्र कधी बघितलं ते आम्हाला समजलंच नाही.

आमच्या प्रेमप्रकरण्यामुळे घरात वादळच उठलं. दादानं मलाही बडवलं. आईबाबा मला वाचवायला ही आले नाहीत. वहिनीमध्ये पडली नसती तर दादानं माझा जीवच घेतला असता.

घाईघाईनं माझं लग्न ठरवलं. घाईनंच उरकून घेतलंय. या लोकांमुळे माझं प्रेम अपूर्ण राहिलं, कधी क्षमा करणार नाही मी या लोकांना.

‘‘ओ मॅडम…जरा जागा द्या आम्हाला बसायचंय.’’ कुणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणालं.

मी दचकून भानावर आले. ‘‘ही रिझर्व्हड बर्थ आहे.’’ त्याचा हात झटकत मी म्हणाले. तेवढ्यात अजून दोन तरूण आले अन् आचरटपणा करायला लागले. मी जोरानं ओरडले, ‘‘सार्थक…’’

झोपलेले सार्थक दचकून उठले. तीन तरूण मला त्रास देताहेत बघून ते त्यांच्यावर धावून गेले. रात्रीची वेळ…प्रवासी झोपलेले होते, पण मी मोठमोठ्यानं रडू लागले. त्यानं जवळचे प्रवासी जागे झाले. ते सार्थकच्या मदतीला धावले. कुणी तरी रेल्वे पोलीसांना बोलावून घेतलं. सगळा डबा एव्हाना जागा झाला होता.

मी खूपच घाबरले होते…‘‘मेघा, बरी आहेस ना? कुठं लागलंय का तुला?’’ सार्थक प्रेमानं अन् काळजीनं विचारत होते. त्यांनी मला जवळ घेतलं. मिठीत घेऊन ते मला शांत करू पाहत होते. त्यांच्या मिठीत मला एकदम सुरक्षित वाटलं. एकदम शांत वाटलं. खरं तर त्यांच्या हाताला लागलं होतं. रक्त येत होतं, पण ते माझीच काळजी करत होते.

तेवढ्यात कुणी प्रवासी म्हणाला, ‘‘सर, त्या बऱ्या आहेत. फक्त घाबरल्या आहेत..तुमच्या हातातून रक्त येतंय, ते बघा आधी…’’

तेवढ्यात कुणी तरी त्यांच्या हाताची जखम पुसून पट्टीही बांधून दिली. सगळे आपापल्या जागी गेले. मला चूक लक्षात आली. सार्थकसारख्या सज्जन, प्रेमळ माणसाशी मी तुसडेपणानं वागत होते. किती स्वार्थी होते मी.

सार्थकच माझे पती आहेत. माझं सर्वस्व, माझे जीवनसाथी आहेत. यापुढे माझा प्रत्येक क्षण त्यांच्या सुखासाठी असेल…

एक प्रवास

 * सुवर्णा पाटील

‘‘हॅलो आई, काय म्हणते? कशी आहेस?’’

‘‘मी बरी आहे रे संभव, पण तू उद्या नक्की ये. तू प्रॉमिस केलं आहेस. मागच्या वेळेसारखं करू नको.’’

‘‘हो गं आई, आता नक्की सांगितले ना. माझी महत्त्वाची मीटिंग आहे, नंतर बोलतो.’’

फोन ठेवताच संभवच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. त्याला इतक्यात लग्न करायचे नव्हते. पण त्याचे घरचे ऐकायलाच तयार नव्हते. त्याचे कुणावर प्रेम होते असेही नाही. पण त्याला आता करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. आईच्या वाढत्या आजारपणामुळे तो तिच्या या इच्छेला नाकारूही शकत नव्हता. म्हणून अनिच्छेने का होईना तो यावेळी मुलगी बघायला तयार झाला. घडाळयाकडे लक्ष जाताच त्याने पटकन आवरले व ऑफिसात गेला.

संध्याकाळी परत आल्यावर संभवने पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हलची वेळ पहिली आणि स्टॉपला जाऊन उभा राहिला. ट्रॅव्हल थोडी उशिराच आली. त्यात त्याचा शेवटचा स्टॉप असल्याने गाडी पूर्ण प्रवाश्यांनी भरलेली होती. फक्त एका युवतीशेजारील जागा रिकामी होती. त्याने तिची बॅग हळूच उचलून खाली ठेवली व तिथे बसला. संभवने पाहिले ती युवती झोपलेली होती. तिच्या पूर्ण चेहऱ्यावर रुमाल होता. त्याची नजर ट्रॅव्हलच्या खिडकीतून बाहेर गेली. पौर्णिमेच्या चंद्राचे छान असे चांदणे पडले होते. त्या चांदण्याच्या प्रकाशात त्या युवतीचे लांबसडक सोनेरी केस चमकत होते. बाहेरच्या गार वाऱ्याने ते केस रुमालाच्या बंधनाला झुगारून संभवच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. क्षणभर का होईना संभव त्या स्पर्शाने मोहरून गेला. पण त्याने लगेच स्वत:ला सावरले व तो थोडे अंतर ठेवून बसला.

दिवसभरच्या दगदगीने त्यालाही लवकर झोप लागली. पण ड्रायव्हरने जोरात गाडीचा ब्रेक मारल्याने सर्वच प्रवासी घाबरून उठले. सर्वांनी विचारल्यावर ड्रायव्हरने सांगितले की, पुढे मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे गाडी थांबली आणि पुढचे ४-५ तास तरी वाहतूक सुरळीत होणार नाही.

‘‘का? हे, या सर्व गोष्टी आजच घडायच्या होत्या का. उद्या सकाळी पुण्याला नाही पोहोचले तर आई मला नक्की रागवेल….आता काय करू?…नेमकी फोनलाही रेंज नाही…’’

संभव शेजारील युवतीची ती अखंड चालणारी चिंतायुक्त बडबड ऐकत होता. तिच्या चेहऱ्यावरील रुमाल आता खाली आला होता. तिचे हळुवारपणे हलणारे गुलाबी ओठ, लांबलडक केसांना एका बाजूने घातलेली सागरवेणी, कपाळावर छोटीशी टिकली, पाणीदार डोळयातील रेखीव काजळ, चंद्राच्या प्रकाशात तिची गोरी कांती खुपच खुलून दिसत होती. किती सिंपल तरीही आकर्षक दिसत होती.

त्या युवतीचे संभवकडे लक्ष गेले. तो एकटक आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यावर ती सावरून बसली. संभवलाही थोडे ऑकवर्ड वाटले. त्याने त्याची नजर दुसरीकडे वळवली. पण तिची चुळबूळ काही कमी होत नव्हती हे पाहून संभव तिला म्हणाला, ‘‘मॅडम, काळजी करू नका. लवकरच वाहतूक सुरळीत होईल. तुम्हाला अर्जंट फोन करायचा असेल तर तुम्ही माझा फोन घेऊ शकता, माझ्या फोनला रेंज आहे.’’

त्या युवतीने संभवचे निरीक्षण केले. त्याच्या व्यक्तिमत्त्वावरून तर तो एक सभ्य तरुण वाटत होता आणि तिला आता त्याच्या फोनची गरजही होती. तिने त्याचा फोन घेऊन घरी कॉल केला

‘‘हॅलो आई…मी सुरभी बोलते…’’

‘‘हा कुणाचा नंबर आहे गं, इतक्या रात्री का फोन केला…आणि तू येतेस आहे ना उद्या…’’

‘‘हो गं बाई, हो सांगितले ना, माझे ऐकून तर घे. मी निघाली, पण इथे पुढे एका गाडीला अपघात झाला आहे. वाहतूक बंद आहे. मी दुसऱ्या व्यक्तीच्या फोनवरून तुला कॉल करत आहे. तू काळजी करू नकोस. मी येते सकाळपर्यंत…’’

‘‘बरं…पण काळजी घे…आणि हो आतापर्यंत ती लोक आपल्या घरी तुला पाहण्यासाठी येतील तर उशीर करू नको.’’

सुरभीने संतापातच फोन कट केला. इथे मी अडकली आहे आणि तिला त्या पाहुण्यांची पडली आहे. संभव तिच्याकडे बघत होता. ‘तिची होणारी तारांबळ, आईवरील लाडीक संतापात तर ती खुपच गोड दिसत होती, नाव पण किती सुंदर…सुरभी…’

‘‘सॉरी हं…मी माझा राग तुमच्या फोनवर काढला.’’ सुरभीच्या शब्दांनी संभव भानावर आला.

‘‘इट्स ओके. पण काळजी करू नका. सकाळपर्यंत तुम्ही पुण्याला पोहोचाल. सॉरी हं…मी तुमचे फोनवरील संभाषण ऐकले. बाय द वे…मी संभव …मीही पुण्यालाच जात आहे.’’

‘‘मी सुरभी…तुमचे खूप खूप आभार. तुमच्या फोनमुळे मला घरी कॉल करता आला…’’ तेवढयात गाडीतील काही मुलांचा घोळका सामान घेऊन खाली उतरताना दिसला. संभवने त्यांना विचारले,  ‘‘काय रे भाऊ, तुम्ही सगळे कुठे चाललात…?’’

‘‘अरे दादा, आम्ही नेहमीच या रस्त्याने प्रवास करतो. इथे नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. इथून २-३ किलोमीटरची पायवाट आहे. पुढे लहान गाडया असतात, त्या पुण्याला जातात…तिथूनच जात आहोत.’’

‘‘पण इतक्या अंधारात…रस्ता सुरक्षित आहे का…?’’

‘‘ हो, आम्ही बऱ्याचदा जातो याच रस्त्याने आणि आमच्याकडे टॉर्चही आहे.’’

संभवने सुरभीकडे पाहिलं. सुरभीही विचार करू लागली. त्या मुलांच्या घोळक्यात २-३ मुलीही होत्या. जरी ती कोणाला ओळखत नसली तरी कराटे चॅम्पियन असल्याने काही घडलेच तर ती स्वत:ला सांभाळू शकणार होती. विशेष म्हणजे संभवचे वागणे तिला खुपच विश्वासाचे वाटत होते. म्हणून तिनेही लगेच होकार दिला. ते दोघेही त्या मुलांच्या घोळक्यासोबत खाली उतरून त्या पायवाटीवर चालू लागले.

ती मुले मुली एका कॉलेजचीच होती. त्यांच्यासोबत मैत्री करून हे दोघेही त्यांच्यासोबत चालू लागले आणि सोबतीला मोबाईल वरील सुरेल गाणे…रस्ता दाट जंगलाचा होता पण पौर्णिमेचा चंद्र त्याच्या शितल छायेचे अस्तित्व जाणवून देत होता. त्यामुळे वाट तितकी बिकट वाटत नव्हती. चालतांना अचानक एका दगडावरून सुरभीचा पाय निसटला. तिचा तोल जाणारच होता, पण संभवने तिला सांभाळले. क्षणभर का होईना तो स्पर्श दोघांना मोहरून गेला. ते काही क्षण ते एकमेकांच्या मिठीतच होते. तेवढ्यात मोबाईलवर गाणे सुरू झाले…

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली

मिटले चुकून डोळे हरवून रात गेली…

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी

कळले मला न केव्हा निसटून रात गेली…

मुलांच्या हसण्याने ते भानावर आले. सुरभी लाजून संभवपासून दूर झाली.

संभवलाही कुठं बघू असे झाले.

‘‘ईट्स ओके यार, असं होतं कधी कधी…पण सांभाळून चला आता…’’

पण सुरभीला चालतांना त्रास होऊ लागला. दगडावर घसरल्याने बहुतेक तिचा पाय थोडासा मुरगळला होता. ती तशीच लंगडत चालत होती. संभवने तिला विचारले,  ‘‘सुरभी, तुझ्या पायाला जास्त लागले का, तू अशी लंगडत का चालत आहे…?’’

आताच घडलेल्या प्रसंगाने सुरभी संभवच्या नजरेला नजर देण्याचे टाळत होती. ती संभवच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित तर होतीच, पण त्याचा आश्वासक स्पर्श व डोळयातील काळजीने ती त्याच्यात गुंतत होती. आपण घरी कशासाठी चाललो हे तिला आठवले. तिने आजपर्यंत शिक्षणाचे कारण सांगून लग्नाचा विषय टाळला होता, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर ती टाळू शकत नव्हती. उद्या घरी तिला त्याच कारणासाठी जायचे होते.

‘‘सुरभी, काय म्हणतो आहे मी…तुझे लक्ष कुठे आहे?…आपण थोडं थांबायचे का…?’’

‘‘नको…नको…मी ठीक आहे. थोडासा पाय मुरगळला आहे, पण मी चालू शकते…’’

तरीही संभवने तिला आधार दिला. ‘‘हे बघ, सुरभी आपली काही तासांचीच ओळख आहे पण तुला इथून पुण्यापर्यंत सुरक्षित नेणे मी माझी जबाबदारी समजतो. तू मनात दुसरे कोणतेच विचार आणू नको…चल.’’

संभवचा हात तिच्या हातात होता. काय होते त्या स्पर्शात… विश्वास, मैत्री, काळजी. सुरभी त्याला नकार देऊच शकली नाही. खरंतर कोणत्याही मुलीशी असे वागण्याची संभवची ही पहिलीच वेळ होती, पण सुरभीबद्दल त्याला काय वाटत होते हे त्याला कळतच नव्हते. तिची प्रत्येक अदा, बोलण्याची लकब, तिच्या हाताचा कोमल स्पर्श व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने त्याच्यावर दाखवलेला विश्वास…या सर्व गोष्टीचा तो विचार करत होता.

‘‘संभव, तुला माझ्यामुळे उगाच त्रास होत आहे.’’

‘‘सुरभी, तू असे का म्हणतेस. असे समज एक मित्र दुसऱ्या मित्राची मदत करत आहे.’’ आणि तो छानसे हसला.

‘‘तुझी  स्माईल काय किलर आहे.’’

‘‘काय…?’’

आपण काय बोललो हे लक्षात आल्यावर सुरभीने जीभ चावली. पण संभवने हसून तिला दाद दिली. कॉलेजातील मुलांच्या गटाबरोबर गप्पा गोष्टीत केव्हा रस्ता संपला हे लक्षातच आले नाही. ते जंगलातून एका छोटया रस्त्याला लागले. तिथे एक लहानसे हॉटेल होते. संभवने सुरभी व त्याची ऑर्डर दिली. सुरभी फ्रेश होऊन हात पाय धुवून आली. पाण्याचे ओले तुषार अजूनही तिच्या लांबसडक केसांवर बिलगले होते.

‘‘ही किती गोड दिसते यार… हिचे प्रत्येक रूप मला वेडच लावत आहे. पण काय उपयोग या एका भेटीनंतर तिच्या व माझ्या वाटा कायमच्या वेगळया होतील.’’ हा विचार  करताना त्याच्या चेहऱ्यावर उदासीचे भाव उमटले.

‘‘संभव, काय झाले…? या चांदण्या रात्रीत गर्लफ्रेंडची आठवण आली का…?’’

सुरभीच्या चेहऱ्यावरील खटयाळ भाव पाहून संभवचे विरहाचे विचार तिथंच विरघळले.

‘‘नाही गं बाई, मला कुणी गर्लफ्रेंड नाही. चल जेवू या लवकर.’’ त्याच्या या वाक्याने खरंतर सुरभी सुखावली होती. तिने त्याच आनंदात जेवण संपवले. तोपर्यंत मुलांनी गाडीची सोय केली होती. गाडीतही सुरभी व संभव जवळजवळच बसले होते. त्यांच्या जीवाला हुरहूर लावणाऱ्या प्रवासाचा तो शेवटचा टप्पा होता. गाडी सुरु झाल्यावर थकव्याने सुरभीची मान अलगद संभवच्या खांद्यावर विसावली. संभव थकला असूनही हे सुंदर क्षण तो मनाच्या कोपऱ्यात जतन करून ठेवत होता.

ड्रायव्हरने गाडीचा ब्रेक लावला तशी सुरभी उठली. तिचा स्टॉप आला होता. सुरभीने जाता जाता पुन्हा एकदा प्रेमाने संभवचा हात हातात घेतला. ‘‘संभव, मी हा प्रवास कधीच विसरणार नाही. तो नेहमी माझ्या सुंदर आठवणीतील एक असेल…’’ तिला खूप काही बोलायचं होतं, पण शब्द साथ देत नव्हते. शब्द केव्हा अश्रू होऊन डोळयातून ओघळले हे तिलाच समजले नाही. संभवचीही हीच स्थिती होती. त्याने अलगद तिला थोपटले आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन भरलेल्या डोळयांनी तो गाडीत बसला.

संभव घरी पोहोचला. त्याने आईशी काहीही न बोलता जाण्याची तयारी केली. आईला वाटले प्रवासाने थकला असेल. ते ठरलेल्या वेळी पाहुण्यांच्या घरी गेले. संभवचे कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नव्हते. मुलीची आई मुलीचे कौतुक करत होती.

‘‘आमची सूर खूपच हुशार आहे. तिच्या हाताला तर अशी चव आहे…’’ संभवला या सर्व गोष्टीचा खूप राग येत होता. त्याच्या नजरेसमोरून सुरभीचा चेहरा जातच नव्हता. आईला माझे लग्नच हवे आहे ना, मग मी कुठूनही सुरभीला शोधेन. त्याने मनाशी पक्का निर्णय केला व मान वर करून म्हणाला, ‘‘थांबवा हे सगळे, मला हे लग्न…करायचे…’’ पण पुढचे शब्द ओठातच राहिले, कारण…समोर चहाचा ट्रे घेऊन सुरभी उभी होती. त्याच्या लक्षात आले… या घरातील सूर म्हणजे माझी सुरभीच आहे.

‘‘काय झाले संभव…? काही सांगायचे आहे का तुला…?’’ आईच्या शब्दांनी संभव भानावर आला. तो खाली बसला व म्हणाला, ‘‘मला हे लग्न करायचे आहे. मला मुलगी पसंत आहे…’’

त्याच्या या वाक्याने सर्वांना आश्चर्य तर वाटले, पण त्याहून जास्त आनंद झाला. सुरभीच्या रडून रडून सुजलेल्या डोळयांतूनही आनंद अश्रू आले, पण ते फक्त संभवलाच दिसले.

सर्वांच्या नजरांपासून नजर लपून या  दोन प्रेमी जीवांचे  मनोमिलन सुरू होते. यावेळी त्यांना हेच गाणं आठवत होतं…

अधीर मन झाले, मधुर घन आले

धुक्यातुनी नभातले, सख्या…प्रिया…

सरातुनी सुरेल, धुंद हे स्वर आले…

सुखाचा सोबती – अंतिम भाग

दीर्घ कथा * सीमा खापरे

पूर्व भाग :

शाळकरी वयातच सुमाची भेट वसंतशी झाली. ती त्याच्या प्रेमात होती. तिला वसंतशी लग्न करायचं होतं. वसंत मात्र सातत्याने तो विषय टाळत होता. शेवटी वसंतच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सुमा व वसंतचं लग्न झालं. सुमाला एक मुलगीही झाली अन् वसंतने आपलं खरं रूप दाखवायला सुरूवात केली. सुमाला जेव्हा समजलं की त्याला आधीच्या लग्नाची बायको व मुलंही आहेत, तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी झाली.

– आता पुढे वाचा…

आकाशपाताळ एक करणं म्हणजे काय याचा प्रत्यय सुमाला वसंतशी लग्न करताना आला होता. लग्न फार म्हणजे फारच साधेपणाने झालं. वसंतकडून कुणी दोघंतिघं अन् हेमाताई, रमण भावोजी अन् विलियम…लग्नसमारंभाचा उत्साह नाही की पाहुण्यांची वर्दळ, चेष्टामस्करी नाही. पण सुमा मात्र खूप आनंदात होती. जे हवं ते मिळवलं होतं तिने. रमण भावोजींनी गावातच तिला एक घर घेऊन दिलं. हेमाताईने घरासाठी लागणारं सगळं सामान आणलं. घर मांडून दिलं. शिवाय बराचसा पैसा तिच्या अकांउटला टाकला होता. वसंत तरीही नाराजच होता. ताई भावोजींसमोर काही बोलला नाही. ते गेल्यावर मात्र त्याने मनातला सगळा राग काढला.

त्याच्या मते तिच्या लोकांचा वसंतवर विश्वास नाही म्हणूनच त्यांनी घर, सामान, वगैरे सर्व सुमाच्या नावे केलं होतं. त्याचं हे रूप बघून ती चकित झाली. हतबद्ध झाली. हेमाताईने त्यांच्या हनीमूनसाठी उटीची तिकिटं अन् हॉटेलचं बुकिंगसुद्धा करून ठेवलं होतं. वसंत संतापून बोलला, ‘‘आता आमचा हनीमूनही तुझ्या बहिणीच्या इच्छेप्रमाणे होणार का?’’

‘‘मग तू ठरव दुसरी कुठली जागा?’’ तिने त्याला प्रेमाने म्हटलं.

‘‘बघूया…’’ वसंतने टाळलंच. हनीमून झाला नाही. लग्नानंतर दोन महिन्यांतच वसंतने धंद्यासाठी हवे आहे म्हणून तिच्या अकाउंटमधून दोन लाख रूपये तिला काढायला लावले. सुमा बघत होती, वसंतला लग्नाविषयी अजिबात आस्था नव्हती. नवी नवरी, तिची नव्हाळी या बाबतीत तो अगदीच रूक्षपणे वावरत होता. बायकोकडे चक्क दुर्लक्षच करत होता. तिला फार एकाकी अन् उदास वाटायचं.

वसंत तोंडाने वाद घालत नव्हता, भांडण करत नव्हता पण त्याचा तो थंडपणा तिला सहन होत नव्हता. ती आतल्या आत मिटून गेली, खंतावत राहिली,

कित्येकदा तो बाहेर जायचा. गेला की अनेक दिवस बाहेरच असायचा. सांगितलेल्या दिवशी कधीच परत येत नसे. ती घाबरून रात्र रात्र जागी राहायची. तो कुठे आहे, काय करतो आहे, तिला काहीच ठाऊक नसायचं. घरात आपण टेलिफोन घेऊयात असं तिने अनेकदा म्हटलं पण ‘‘ठीकाय, बघूयात,’’ म्हणून तो ती गोष्ट टाळायचा.

हेमाताईने तिला दोन मोबाइल फोन घेऊन दिले. एक तिच्यासाठी, दुसरा वसंतसाठी, पण वसंतचा फोन कायम स्विच ऑफ असे नाही तर तो फोन डिस्कनेक्ट करून टाके. हेमाताईशी ती जवळजवळ रोजच बोलायची. पण ‘‘सगळं ठीक आहे,’’ याव्यतिरिक्त काहीही बोलत नसे. काय सांगणार? वसंतच्या कागाळ्या, तक्रारी ती कोणत्या तोंडाने ताईला सांगणार होती?last-part-inside-image

घरात तेल, तांदूळ, डाळ, पीठ, साखर आहे किंवा नाही याच्याशी वसंतला काहीच देणंघेणं नसे. ‘‘घरातलं सामान संपलंय, सामान आणायला हवंय,’’ वगैरे म्हटलं की तो पार गप्प बसायचा किंवा घराबाहेर निघून जायचा. तिला त्याचा हा अलिप्तपणा, कोरडेपणा विलक्षण खटकायचा. शेवटी तीच बँकेतून पैसे काढून आणायची. घरसामान आणायची. घरातल्या इतर काही गरजेच्या गोष्टी आणायची. वसंतबरोबर लग्न करून संसार करण्याची जी स्वप्नं तिने बघितली होती, ती पार धुळीला मिळाली. वसंतच्या प्रेमात ती वेडी झाली होती. आता त्याच्या या कोरड्या वागण्याने एकदम उद्ध्वस्त झाली. पूर्वीचा तो प्रेमळ वसंत कुठे गडप झाला तेच कळत नव्हतं.

रमण भावोजींनी तिला सगळी कॅश रक्कम न देता घर अन् संसाराचं सामान का घेऊन दिलं ते तिला आता लक्षात येत होतं.

लग्नाला आता वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला होता. वसंत गेले वीस दिवस बाहेर होता. घरातली कामं कशीबशी आटोपून ती बाहेरच्या बाल्कनीत येऊन उभी राहिली.

‘‘कशी आहेस, सुमा?’’ तिने आवाजाच्या दिशेने वळून बघितलं. शेजारची निर्मला तिच्या बाल्कनीतून विचारत होती.

‘‘बरी आहे मी,’’ तिने थोडक्यात आटोपायला बघितलं. ‘‘तुम्ही कशा आहात?’’

‘‘एकदम मजेत. वसंत भाऊ परत आले की नाही?’’

सुमा वैतागली. म्हणाली, ‘‘अजून नाही आलेले. दोन एक दिवस लागतील.’’

‘‘अरेच्चा? कालच तर मी त्यांना बिग बाजारमध्ये बघितलं. मी हाकदेखील मारली पण ते बहुधा घाईत होते.’’ निर्मला खोचकपणे म्हणाली.

तिरमिरीसरशी आत येऊन सुमाने वसंतला फोन केला. त्यानं फोन घेतला अन् फोनवरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. तिला एकदम रडायलाच आलं. ती खूप वेळ रडत होती. मग तिने हेमाताईला फोन करून सगळं सांगितलं. इतके दिवस जे तिने लपवून ठेवलं होतं ते सगळं सगळं तिने हेमाताईला सांगितलं. त्याच दिवशी वसंत घरी आला अन् रडतरडत आयुष्य सुरू झालं.

मनाच्या अशा विषण्ण, उदास अवस्थेतच दिवस गेल्याचं सुमाच्या लक्षात आलं. ती आनंदाने मोहरली. तिने खूप आनंदाने ही बातमी वसंतला सांगितली. तर तो संतापून बोलला, ‘‘वेड लागलंय तुला? अगं तुलाच सांभाळताना जीव जातोए माझी, अन् आणखी ही एक जबाबदारी? मला मूल नकोय…अजिबात नकोय.’’

‘‘काय बोलतोस रे?’’ ती खूप दुखावून आश्चर्याने म्हणाली. पुन्हा भांडण…रडणं…ज्या बातमीने घरात आनंद पसरायला हवा त्याने त्या घरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वसंतला मूल नको होतं अन् ती कुठल्याही परिस्थितीत गर्भपाताला तयार नव्हती. एकेक दिवस उगवत होता अन् मावळत होता.

अन् मग वसंतनेही आपला हट्ट सोडला. तो सुमाची काळजी घेऊ लागला. सुमाला आश्चर्य वाटलं हे एकाएकी परिवर्तन कसं? वाळवंटात गुलाब बहरले कसे? कारण त्याच्या निगेटिव्हिटीचीच तिला सवय झाली होती. पण सुखद बदल नेहमीच हवेसे वाटतात. एकूण गरोदरपणाचे नऊ महिने अवघड असूनही चांगले गेले. वसंतने सुमाचेच पैसे वापरून बाळाच्या जन्माआधीच बाळासाठी लागणारं सर्व सामान घरात आणून टाकलं. वसंतचं प्रेम थेंबाथेंबाने पुन्हा तिला मिळत होतं. तेवढ्यावरच ती खूश होती. बाळाच्या येण्याची वाट बघत होती. या बाळामुळेच वसंत बदलला आहे, असं तिला वाटत होतं.

सुमाला मुलगी झाली. वसंतने चांगल्या इस्पितळात बाळंतपणाची व्यवस्था केली होती. बाळाला कुशीत घेताना अत्यानंदाने सुमाला रडू आलं. आई होण्याचा आनंदच अपूर्व होता.

हेमाताई, रमण भावोजींनाही खूप आनंद झाला. बाळासाठी बाळलेणी, सुमा, वसंतसाठी ढीगभर आहेर घेऊन ती दोघं आली होती. थाटात बारसं झालं. वसंतच्या व्यवस्थापनाचं खूप कौतुक झालं. मुलीचं नाव ठेवलं शुभदा, लाडाने तिला शुभी म्हणायचे.

वसंतला पुन्हा धंद्याच्या कामाने शहराबाहेर जायचं होतं. तो शुभीला मांडीवर घेऊन खेळवत होता. सुमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने विचारलं, ‘‘काय विचार करतो आहेस?’’

‘‘सुमा, आपल्या मुलीला मी खूप चांगलं शिक्षण देईन. शहरातल्या सगळ्यात चांगल्या शाळेत तिला घालीन. बघ तू, आपली मुलगी राजकन्येसारखी वाढेल. मला तिच्यासाठी काय काय करायचं आहे. मला हल्ली बाहेर जाण्याचाही कंटाळा येतो. तुम्हां दोघींना सोडून जावंसं वाटत नाही. मी इथेच काम सुरू करीन म्हणतो.’’

सुमाला समजेना. इतका आनंद कुठे ठेवावा. कसा सांभाळावा. तिला फक्त वसंतचं प्रेम अन् त्याने कष्टाने कमवलेला पैसा एवढंच हवं होतं अन् नेमकं तेच तिला मिळत नव्हतं. पण लेकीच्या पायगुणाने वसंत बदलला होता.

इतक्यातच वसंत पुन्हा काळजीत असल्यासारखा वाटत होता. तिने विचारलं तर ‘काही नाही…’ म्हणून टाळायचा. पण एक दिवस मात्र तो हमसाहमशी रडायला लागला. सुमा घाबरली.

‘‘अरे काही तरी बोल ना? काही सांगशील तर ना मला कळेल?’’ तिने म्हटलं.

‘‘माझ्या पार्टनरने मला दगा दिला…फसवलं. मला अंधारात ठेवून त्याने सगळा पैसा आपल्या नावावर करून घेतला. मी पार बुडालो गं…’’ वसंत पुन्हा गदगदून रडू लागला.

तिच्या पायाखालची जमीन हादरली, ‘‘तू…तू… पोलिसात तक्रार दिलीस का?’’ तिने विचारलं.

‘‘ते सगळं केलंय मी…मी त्याला असा सोडणारही नाहीए…मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे. पण त्याला बराच वेळ लागेल. कोर्टात केस करायलाही खूप पैसा लागेल. तोवर आपण जगायचं कसं? नवा काही व्यवसाय सुरू करायला तरी पैसा हवा ना जवळ?’’ तो अगदी बापुडवाणा झाला होता.

‘‘तू शांत हो…आपण बघूया…काहीतरी मार्ग निघेल…’’ तिने म्हटलं. पण ते शब्द अगदी पोकळ होते हे तिलाही कळत होतं.

वसंत खूप धावपळ करत होता. तो सतत काळजीत असायचा. तीही त्यामुळे काळजीत असे. किती तरी दिवसांनी थोडा सुखाचा काळ आयुष्यात आला होता. तोही असा झटक्यात संपला. वसंतला पुन्हा नव्याने धंदा सुरू करायचा होता त्यासाठी त्याला पैसे हवे होते. आता तर सुमाच्या अकाउंटलाही फार पैसे उरले नव्हते. वसंतची चिडचिड सुरू होती. ती त्याला समजावत होती, ‘‘अरे, सगळेच काही लाखो रुपये घालून बिझनेस सुरू करत नाहीत. काही छोटासा धंदा बघ, कमी पैशांतून सुरू करून वाढवता येईल असा व्यवसाय शोध. अन् नाही तर सध्या एखादी नोकरीच बघ. व्यवसायाचं नंतर बघू अन् नाहीतर तुझ्या वडिलांना विचार ना ते आर्थिक मदत करू शकतील का?’’

वसंत एकदम भडकला. ‘‘तुझ्याशी लग्न केलं नसतं तर आईवडील अन् त्यांची प्रॉपटी माझीच होती. पण तुझ्याशी लग्न करून बसलो. आता मी कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे पैसे मागू? अन् पैसे मला एकट्याला थोडीच हवेत? पैसा मिळेल तेव्हाच मुलीला चांगल्या शाळेत घालता येईल ना?’’

‘‘पण मग मी तरी कुठून आणू पैसा? माझे आईवडील तरी कुठे जिवंत आहेत?’’ तीही संतापून बोलली.

‘‘पण आईवडिलांचं घर तर आहे ना? तुझाही वाटा आहेच ना त्यात? तुझ्या बहिणीला सांग, तुझा वाटा तुला देईल ती.’’ वसंतने स्पष्टच सांगितलं.

ऐकून ती अवाक् झाली. पार बधीर झाली. विचार करण्याची शक्तीच नाहीशी झाली तिची. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा ती शून्यावरच येऊन पोहोचली. घरात कायम तणावाचं वातावरण होतं. फक्त आता वसंत घराबाहेर जात नव्हता अन् मुलीला प्रेमाने सांभाळत होता.

एक दिवस तो प्रेमाने तिला म्हणाला, ‘‘हे बघ सुमा, मला समजून घे. अगं, माझ्याकडे पैसे असते तर मी तुझ्याकडे तरी असा दीनवाणा होऊन पैशाची याचना केली असती का? मला पैसा उभा करता आला असता तरी मी तुला एका शब्दाने पैसे मागितले नसते अन् तुझे आईवडील जर त्या घरात असते तरी मी चकार शब्दाने घर विकण्याबद्दल बोललो नसतो. ते घर रिकामं पडून आहे. तू अन् हेमाताईच त्या घराच्या वारसदार आहेत. या क्षणी तुला म्हणजे आपल्याला पैशाची गरज आहे तर ते घर विकून आपण पैसा उभा करू शकतो. मी एक एक पैशाचा हिशेब देईन तुला. अन् जे काही पैसे मी घेतोए ना , ते तुला व्याजासकट परत करीन. मला माझ्या मुलीसाठी माझंही आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. एकदाच फक्त माझ्यावर विश्वास ठेव.’’

आठदहा दिवस ओळीने हेच संवाद तो बोलत होता. शेवटी तिने सगळा धीर गोळा करून कसाबसा हेमाताईकडे विषय काढला. हेमाताई एकदम संतापली.

‘‘अगं, आईबाबांची एकमेव आठवण आहे ती. आपलं माहेर, आपल्या बालपणीच्या अगणित आठवणी रेंगाळताहेत त्या घरात. ते घर विकणार नाही. तुझा तो नालायक वसंत सतत पैसे मागतो अन् तू देतेस, गेल्या दोन अडीच वर्षांत त्याने फक्त मनस्ताप दिलाय तुला. सतत काळजी अन् टेन्शन. सुखाचे दिवस नवऱ्याने द्यायचे असतात बायकोला. हा तर फक्त छळ करतोए तुझा. आधी त्याला मूल नको होतं. आता त्याला मुलीचा पुळका आलाय. तिच्या नावावर पैसे काढायला बघतोए. ते घर घशात घालायचं आहे त्याला. तुला हे सगळं कसं कळत नाहीए? शेवटचा पैसा संपल्यावर भीक मागायची वेळ आली म्हणजे कळणार आहे का? अगं तुला मुलगीच मानतो आम्ही दोघं म्हणून आजवरच्या दिलेल्या पैशांचा कधी हिशोब मागितला नाही अन् मागणारही नाही. त्या घरात तुझा वाटा आहेच पण बाहेरच्या कुणा उपटसुंभाला मी तो मिळू देणार नाही…’’ बोलता बोलता हेमाताई रडायलाच लागली.

तिला त्यावेळी कळलं ती किती खुजी आहे. हेमाताईचं तिच्यावर किती प्रेम आहे. सदैव त्या प्रेमापोटी ती सुमाला सांभाळून घेते. पण वेडी सुमा… तिला ताईच्या प्रेमाची मातब्बरी नाहीए. अजूनही तिचा वसंतच्या प्रेमावर विश्वास आहे. खरंच, प्रेम आंधळं असतं.

तिला रडू अनावर झालं. किती तरी वेळ रमण भावोजी अन् हेमाताई तिची समजूत घालत होती. वसंत लफंगा आहे. तुझ्यासारखी भाबडी अन् बापाचा पैसा असलेली सुंदर पोरगी त्याने प्रेमाचं नाटक करून ताब्यात घेतली आहे. गेल्या अडीच तीन वर्षांत त्याने एक पैदेखील कमवली नाहीए. आतासुद्धा पार्टनरने लुबाडलं ही चक्क थाप आहे. मुलीच्या नावाचा वापर करून त्याला सुमाचा उरलेला पैसाही लुबाडायचा आहे.

तरीही सुमाला वाटत होतं की यावेळी ती पैसे वसंतच्या हातात सोपवणार नाही. पण वसंतने काही तरी करणं गरजेचं होतं. घरखर्च कसा चालणार? बँकेत जेमतेम वर्षभर घरखर्च चालेल एवढाच पैसा होता. काहीही करून एकदा वसंतने व्यवसाय सुरू करावा. पैसा मिळवावा, विस्कटलेली संसाराची घडी नीट बसावी एवढीच तिची माफक अपेक्षा होती. त्यासाठीच तिला पैशांची नितांत गरज होती.

रमण भावोजी अन् हेमाताईला समजत होतं की सुमाचं वय अन् समजूत (म्हणजे अक्कल) वसंतची लबाडी लक्षात येईल एवढी नाहीए. ती भाबडी पोर आपला विस्कटलेला संसार पुन्हा सुरळित व्हावा या आशेने हे सगळं करते आहे. रमण भावोजींनी खरं तर आतापर्यंत हेमाच्या वाटणीच्या पैशांपैकीही कितीतरी रक्कम सुमालाच दिली होती. ते स्वत: चांगलं कमवत होते त्यामुळे हेमाला माहेरच्या पैशांची तशी गरज नव्हती. पण वडिलांचा आशीर्वाद व त्यांच्याकडून वारसा म्हणून मिळणारा पैसा शेवटी दोघी बहिणींचा होता. रमण भावोजींनी शेवटी घर विकलं अन् अर्धा पैसा सुमासाठी वेगळा काढला. त्यातील निम्माच त्यांनी सुमाच्या नावावर केला अन् निम्मा शुभीच्या नावाने फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवला. काहीही करून त्या हलकट वसंतच्या हाती सगळा पैसा पडू नये म्हणून ती दोघं जपत होती.

पण वसंतच्या हुशारीमुळे त्यांची खटपट निरर्थक ठरली. काही महिन्यांतच वसंतने सगळा पैसा उडवला अन् पुन्हा तीच रडकथा सुरू झाली. आता तर तो दोन दोन महिने घराबाहेर असायचा.

शेवटी घर अन् मुलीची जबाबदारी अंगावर घेऊन ती पुन्हा एकटी उभी होती. दोघांचं नातं अत्यंत कडवट अन् विखारी होतं. काही तरी चुकतंय हे आता तिला जाणवत होतं. मुलीला शाळेत घालताना तिने फक्त स्वत:चं नाव लावलं होतं. फार फार त्रास तिला सोसावा लागला होता. तिचं सगळं अवसान आता संपलं होतं, अगतिकपणे ती रमण भावोजींना म्हणाली होती, ‘‘मला यातून मुक्त करा. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे.’’

रमणने पोलिसात तक्रार केली. स्वत:चे सोर्सेस वापरून वसंतची माहिती मिळवली होती. खरी परिस्थिती कळली तेव्हा सुमा महिनाभर अंथरुणाला खिळून होती.

वसंतची आधी दोन लग्नं झालेली होती. पहिली बायको वारली…नेमकं काय झालं ते कुणालाच ठाऊक नव्हतं. तिचा खून झाल्याची कुजबुज होती. दुसऱ्या पत्नीला तिच्या दोन मुलांसह वसंतचे आईवडील सांभाळत होते. वसंत अक्षरश: मवाली अन् उनाड होता.

आता वसंतशी असलेल्या नात्याला अर्थच नव्हता. हेमाताईने सुमा व शुभीला आपल्या घरी आणलं. ते घर आवरून, कुलूप घालून बंद केलं. सुमाला सावरायला वेळ लागेल हे त्यांना कळत होतं. शेवटी एकदाचा तिचा घटस्फोट मंजूर झाला. त्या कागदपत्रांवर सही करताना सुमाला वाटत होतं या क्षणी आपलं आयुष्य संपवावं. प्रेमाचा मृत्यू म्हणजे माणसाचाही मृत्यूच ना? ओक्साबोक्शी रडली ती त्या दिवशी.

वर्षंभर हेमा अन् रमणने तिला खूप मायेने, प्रेमाने सांभाळलं. हेमाची इच्छा होती तिने इथेच राहावं पण सुमाला तिथे नको वाटत होतं. आधीच्या कॉलेजच्या गावी जाऊन स्वत:च्या घरी रहावं तेही तिला झेपणारं नव्हतं.

एक दिवस अचानक विलियमने हेमाकडे फोन केला अन् सुमाची विचारपूस केली. सगळी परिस्थिती नीट समजून घेतली. सुमाला इथे नोकरी मिळू शकते. तिने इथे येऊन राहावं, असं सांगितलं.

रमणनेच पुन्हा पुढाकार घेतला. आधीचं लग्नात घेऊन दिलेलं घर विकलं. विलियमच्या शेजारी एक छोटासा फ्लॅट घेऊन दिला. हेमाताईने तिचं घर मांडून दिलं अन् तिचं नवं आयुष्य सुरू झालं.

मेजर आनंदकडे नोकरी करताना तिचं दु:ख, वैफल्य ती विसरली. हळूहळू ती कामं शिकली. स्टोअर सांभाळणं, इन्स्टिट्यूटची कामं, ट्रेड फेयरची व्यवस्था एक ना दोन कामं सतत असायची. तिला मेजर आनंदविषयी अनामिक ओढ वाटत होती.

चंपानेरला त्यांनी एक मोठा मेळा भरवला होता. स्थानिक शेतकरी अन् कलाकारांच्या मालाला सरळ ग्राहक भेटत होता. त्यामुळे हा वर्ग खूष होता. ऑफिस स्टाफचे काही लोक तिथेच रात्रंदिवस राहिले होते. शुभीमुळे ती मात्र सकाळी उठून जाऊन सायंकाळी परत येत होती.

मेळ्याला उत्तम प्रतिसाद होता. सगळं छान सुरळित सुरू असताना एक दिवस अचानकच वादळ व पावसाला सुरुवात झाली. सुमाला शुभीची काळजी वाटली. तिने शुभीला कधीच रात्री एकटं ठेवलं नव्हतं. तिची घालमेल मेजर आनंदच्या लक्षात आली. ते स्वत: गाडी काढून तिला पोहोचवयाला निघाले.

वाटेत गाडी बिघडली. सुमा घाबरली. तिच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. मेजरने खाली उतरून बॉनेट उघडलं पण फॉल्ट लक्षात येईना. ते पुन्हा गाडीत बसले अन् फोन करू लागले. तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेतला. आश्चर्याने ते तिच्याकडे बघू लागले.

‘‘तुम्ही कुणालाही फोन करायचा नाही,’’ ती चिडून ओरडली.

‘‘पण का? मेकॅनिकला फोन करावाच लागेल. गाडी नीट झाली नाही तर आपण जाणार कसे? काय झालंय तुम्हाला?’’ आश्चर्याने त्यांनी विचारलं.

‘‘मी आधी फोन करणार.’’ तिने विलियमला फोन लावला. मेजर गाडीतून उतरून एका झाडाला टेकून उभे राहिले. दोन्ही हात पॅण्टच्या खिशात होते अन् ते सुमाकडे आश्चर्याने बघत होते.

पाऊस पडतोय, रस्त्यावर सामसूम, संध्याकाळ दाटून आलेली. सुमाच्या मनात एक अनामिक भीती अन् तिचं लक्ष मेजरकडे गेलं. ते पावसात भिजत अजूनही झाडाला टेकून उभे होते. सुमाला स्वत:चीच लाज वाटली. इतक्या चांगल्या माणसाविषयी आपण चुकीचा विचार केलाच कसा याचं वैषम्यही वाटलं.

गाडीचं दार उघडून ती बाहेर आली अन् गारठ्याने शहारली.

‘‘सर, आत या,’’ तिने म्हटलं.

‘‘का?’’ त्यांनी हसत विचारलं.

‘‘तुम्हीही भिजलात अन् मीही भिजतेय…या ना,’’ तिन वैतागून म्हटलं.

ते गाडीत येऊन बसले. ‘‘आता माझी भीती नाही ना वाटत?’’ त्यांनी हसून विचारलं अन् फोन लावला. फोन लागला. ते काही बोलले. पलीकडून जे काही सांगितलं गेलं ते ऐकून ते वैतागले. ‘‘ओह, नो,’’ ते म्हणाले.

‘‘काय झालं?’’ सुमाने विचारलं.

‘‘दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. आता सर्व रात्र गाडीतच काढावी लागेल.’’

‘‘बाप रे!’’ तिच्या घशाला कोरड पडली. हातपाय गार झाले होते. आता अशा ओल्या कपड्यात रात्र काढायची?

मेजर आनंदनं कॅम्पमध्ये फोन केला. तिथल्या कार्यकर्त्यांने म्हटलं, ‘‘इथेही खूप पाऊस पडतोए, इथून माणूस पाठवता येणार नाही.’’

‘‘आता काय करायचं?’’ तिने घाबरून विचारलं.

‘‘आता शांत डोक्याने इथेच बसून नामस्मरण करायचं. वाट बघण्याखेरीज काही करता येणार नाही. अरे तुम्ही खूप भिजला आहात. एक काम करा, व्हॅनच्या मागच्या सीटवर बॅगेत काही कपडे आहेत. तुम्ही कपडे बदलून घ्या. माझ्या बॅगेत टॉवेल, थर्मासमध्ये चहा अन् थोडी बिस्किटं आहेत. तुम्ही कपडे बदला मग चहा घ्या. थोडं बरं वाटेल.’’ बॅगेतून धुतलेला टॉवेल तिला देऊन मेजर गाडीतून उतरून झाडाखाली जाऊन उभे राहिले.

मेळ्यातल्या स्टॉलवर विकण्यासाठी तयार केलेले ते कपडे होते. गावातल्या बायका घालतात तसा घाघरा कुरता होता. तिने त्यातला तिच्या मापाचा पोषाख निवडला. गाडीतला दिवा मालवून कपडे बदलले. केस कोरडे केले. ओढणी अंगावर घट्ट लपेटून घेतली. खूप बरं वाटलं. मनोमन तिने मेजरला धन्यवाद दिले.

मेजरना तिने गाडीत बोलावलं. ते स्वत: खूप भिजले होते. पण आर्मीच्या कठोर शिस्तीमुळे त्यांना त्याचा त्रास वाटत नव्हता. त्यांनी तिला चहा दिला. चहा, बिस्किटं घेतल्यावर तिला खूपच छान वाटायला लागलं. मेजरने मागची सीट अॅडजस्ट करून तिच्या झोपण्याची व्यवस्था करून दिली. कृतज्ञ नजरेने त्यांच्याकडे बघत तिने प्रश्न केला, ‘‘तुमचं काय?’’

‘‘मी जागा राहीन… मला सवय आहे…तुम्ही शांतपणे झोपा.’’

पाऊस थांबून पडत होता. तिला खरोखर गाढ झोप लागली. सकाळी सहाला मेजरने तिला हलवून उठवलं. रात्रभर त्यांनी केलेल्या फोनमुळे शेवटी एक मेकॅनिक आपल्या सहकाऱ्याबरोबर मोटारसायकलने येऊन धडकला होता.

‘‘चल. तुला आधी घरी सोडतो. आता हा गाडी घेऊन येईल.’’ मेजरने प्रथमच तिला एकेरी हाक मारली होती.

ती घाघरा ओढणी सांभाळून मोटारसायकलवर त्यांच्या मागे बसली.

‘‘सर, आतल्या कच्च्या रस्त्याने जा. मोठ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे टॅफिक जाम आहे,’’ मेकॅनिक म्हणाला. रस्ता खराब होता. ती मेजरना घट्ट धरून बसली होती. या क्षणी तिच्या मनात भीती नव्हती. खूप सुरक्षित वाटत होतं.

बाइक घरासमोर थांबली, ‘‘सर, या ना, चहा घेऊन जा,’’ तिने म्हटलं.

ते फक्त हसले अन् बाइक वळवून निघून गेले. ती वळून घरात आली तेव्हा समोर विलियम उभी होती. तिला अशा पोशाखात बघून ती चकित झाली होती. पण सुमाचं हे रूप तिला आवडलं होतं.

चहा घेताघेता तिने सगळी हकिगत विलियमला सांगितली. तिने कपडे बदलले अन् अंथरुणावर अंग टाकलं. तिला ताप भरून होता.

तिकडे मेजर आनंदही तापाने फणफणले होते. सुमाने यमुनाला फोन करून ती आजारी असल्याचं सांगितलं. यमुनाने खट्याळपणे हसत म्हटलं, ‘‘मेजरही तापाने…तूही तापाने…दोघं एकाच वेळी…त्यातून सारी रात्र एकत्र…काय गं? काय चाललंय?’’

तीही मुक्तपणे हसली. तिला का कोण जाणे पण खूप आनंदी अन् मोकळं मोकळं वाटत होतं. किती तरी वर्षांनी ती अशी मोकळा श्वास घेत होती. तिला वाटलं मेजर आनंदची विचारपूस केली पाहिजे. तिच्यामुळेच ते भिजले होते. तिने त्यांच्यावर संशय घेतला होता. ते तर तिची मदत करत होते. काय गरज होती त्यांना गाडी काढून तिला पोहोचवायची?

तिने फोन केला, ‘‘हॅलो सर, मी सुमा.’’

‘‘बोला, कशा आहात?’’

‘‘मी बरी आहे. तुम्ही कसे आहात?’’

‘‘बराय मी, शुभी कशी आहे? प्रथमच एकटी राहिली ना?’’ तिला नवल वाटलं. तिच्या मुलीचं नाव त्यांना ठाऊक होतं. तिची चौकशी ते करत होते. जन्मदाता बाप तिला विचारत नव्हता. तिला खूप समाधान वाटलं.

तिने हेमाताईला फोन केला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागली. मेजर आनंदविषयी तिच्या मनात आता अपार आदर होता. स्वत:चं दु:ख विसरून इतरांना आनंद देत होते ते. किती माणसं जोडली होती त्यांनी. केवढी मोठी टीम त्यांच्यासाठी राबत होती. पावसाने विस्कळीत झालेला मेळा, त्यातले स्टॉल्स पुन्हा तेवढ्याच उत्साहाने उभारले होते. मेळा यशस्वी झाला होता. सगळेच खूश होते.

सकाळी सुमा झोपून उठली तेव्हा समोर हेमाताईला बधून चकित झाली. ‘‘तू कशी आलीस?’’

‘‘तुला भेटायला आले…तू एक गोष्ट मला सांगितली नाहीस…’’

‘‘काय?’’

‘‘मेजर आनंद…’’

ती गप्प झाली. तिला प्रेमाने जवळ घेत हेमा म्हणाली, ‘‘एक चांगली संधी तुला मिळाली आहे. ती सोडू नकोस.’’ तिच्या समोरच हेमाताईने मेजर आनंदला फोन करून जेवायला येण्याचं आमंत्रण दिलं.

मेजर आनंद आले. सहजपणे शुभी अन् हेमाताईला भेटले. त्यांची अदबशीर वागणूक पाहून हेमाताई खूपच प्रभावित झाली. शुभीशीही ते छान बोलले. तिने त्यांना स्वत: काढलेली चित्रं दाखवली.

गप्पा मारत जेवणं झाली. विलियमही जेवायला होती. निरोप घेताना सर्वांच्या समोरच मेजरने तिला विचारलं, ‘‘माझ्याबरोबर माद्ब्राझी जीवनसंगिनी म्हणून राहायला तुला आवडेल?’’

सुमा गप्प होती. तिला शुभीबद्दल काही बोलायचं होतं. मेजरने शुभीला जवळ घेतलं. ‘‘हिला मी माझी मुलगी मानली आहे अन् बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर माझा विश्वास आहे,’’ ते म्हणाले. हेमाताई अन् विलियमने तिच्या वतीने होकार दिला. ताबडतोब हेमाताईने रमणला फोन लावून लगेच यायला सांगितलं.

रमणने आपल्या परीने सगळी विचारपूस केली अन् लग्नाचा दिवसही नक्की केला.

साध्या पद्धतीने, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.

हेमाताईने तिला नववधूसारखी नटवून रात्री मेजरच्या खोलीत पाठवून दिली. किती तरी वर्षांनी आज तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मेजर खोलीत आले. त्यांनी तिचा हात हलकेच हातात घेतला अन् हलकेच तिच्या गालावर चुंबन घेत म्हटलं, ‘‘आयुष्यभर एकमेकांचे उत्तम मित्र म्हणून राहू. सहयोगी अन् जीवनसाथी म्हणून प्रेम करू. मग एक सांग, तुला माझी भीती नाही ना वाटत?’’

ती लाजली अन् तिने त्यांना मिठी मारली. त्यांनीही तिला मिठीत घेतलं. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी तिची अवस्था झाली होती.

सुखाचा सोबती – पहिला भाग

दीर्घ कथा * सीमा खापर

गुळगुळीत डांबरी रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर अन् पीतमोहराच्या झाडांची लांबलचक रांग होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंद फुटपाथ होते. अन् दिवे लागले की तो रस्ता अधिकच सुंदर भासायचा. गेली कित्येक वर्षं याच वाटेवरून तिची येजा असते.

गेल्या आठ वर्षांत अनेक नोकऱ्या केल्या पण हीच नोकरी बरी दोन वर्षं टिकून आहे. त्या आधीच्या नोकऱ्या ८-१० महिने, फार तर वर्षंभर केल्या. कधी तिने राजीनामा दिला,  कधी नोकरीने ‘बाय बाय’ केलं.

या गुलमोहराच्या झाडाखालून जाताना तिला हमखास वसंत आठवतो. वसंत तिच्या आयुष्यात आला आणि जणू वसंतोत्सव सुरू झाला. दिवस सुगंधी अन् रात्री रेशमाच्या झाल्या.

‘‘तुला माहीत आहे, मला वसंत फार आवडतो.’’ ती स्वप्नाळूपणे म्हणाली.

‘‘खरंच?’’ खट्याळपणे तिच्याकडे बघत त्याने म्हटलं अन् ती लाजून लाल झाली.

‘‘मी वसंत ऋतूबद्दल बोलतेय…’’

‘‘मी पण तेच म्हणतोय,’’ पुन्हा तेच खट्याळ हसणं अन् त्याच्या गालाला पडणाऱ्या खळ्यांमध्ये ती हरवून जाते.

कंपनी पार्कच्या मधोमध असलेल्या घड्याळ्याच्या टॉवरमधून सहाचे टोल पडले अन् ती भानावर येऊन भराभर चालू लागली.

ती घरी पोहोचली तेव्हा शुभी शाळेचा होमवर्क करत बसली होती.

‘‘माझी गुणाची पोर गं ती, छान अभ्यास कर हं!’’ तिने शुभीच्या पाठीवर प्रेमाने थोपटत म्हटलं. हातातली पर्स कपाटात ठेवून हातपाय धुऊन ती स्वयंपाकघरात गेली. चहा पिण्याची प्रबळ इच्छा होती. पण ज्याच्यामुळे चहाची सवय लागली होती तो आता कुठे होता, कुणास ठाऊक.

‘‘अरेच्चा? थर्मासमध्ये चहा अन् हॉटपॉटमध्ये खाण्यासाठी काहीतरी तयार दिसतंय?’’ तिने हसून कौतुकाने म्हटलं.

तेवढ्यात शुभी उठून आली अन् तिच्या गळ्यात पडली. हा लाड कशासाठी आहे हे सुमा जाणून होती. काही न बोलता तिने शुभीचा मुका घेतला.

चहाचा ट्रे घेऊन ती ड्रॉईंगरूममध्ये आली. चहा घेता घेता ती लक्षपूर्वक शुभीकडे बघत होती. शुभी काय, काय, किती, किती बोलत होती. पण चहा संपता संपता ती मुद्दयावर येईल याची सुमाला खात्री होती.

‘‘ममा, प्लीज मला जाऊ दे ना शाळेच्या ट्रिपबरोबर. उद्या पैसे भरण्याचा शेवटचा दिवस आहे. प्लीज ममा, नंतर वाटलं तर कुठेही पाठवू नकोस…ममा, प्लीज, अगं शालू, विजू, जया, निमा सगळ्या जाताहेत गं!’’ शुभी बोलता बोलता रडवेली झाली होती.

थोडी वैतागून सुमा म्हणाली, ‘‘तुला मी आधीच सांगितलं होतं, पाणी असलेल्या ठिकाणी मी तुला पाठवणार नाही म्हणून.’’

‘‘शिट् ममा, अगं मी काय कुक्कुलं बाळ आहे का? उगीचच पाण्यात जाऊ बसेन का मी? मलासुद्धा कळतं ना? एक तर स्वत: मला कुठे नेत नाही आणि आता सगळ्या मैत्रिणी शाळेतून जाताहेत तर तिथेही पाठवत नाहीस?’’ शुभी रडायला लागली.

तिला पोटाशी घेऊन आपणही मोठ्यांदा रडावं असं सुमाला वाटलं. गेली कित्येक वर्षं तीच तर एकटीने सगळं निभावते आहे.

शुभीच्या बाबतीत ती फार हळवी आहे. तिला शुभीची फार काळजी वाटते. नोकरीमुळे ती तशीच दिवसभर शुभीपासून दूर असते त्यामुळे घरी परतल्यावर शुभीपासून दूर राहाणं तिला सहन होत नाही.

शुभीचे अश्रू तिला बघवत नाहीत, तिने प्रेमाने शुभीला जवळ घेतलं. कळतंय तिला की किती दिवस ती शुभीला असं आपल्याजवळ ठेवू शकेल?

शुभीने स्ट्राँग व्हावं, आपल्या पायावर उभं राहावं असं तिलाही वाटतंय. थोडी मोठी झाल्यावर तिला एखाद्या कोर्ससाठी बाहेर पाठवावं लागेल, अशावेळी ती शुभीला अडवून धरेल का? अन् शुभीच्या आयुष्यात कुणी वसंत आला तर? छे: छे:, नकोच! शुभीला मुक्त आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. इतकं ओव्हर प्रोटेक्टिव राहून चालणार नाही.

‘‘उद्या तुझ्या क्लास टीचरला माझ्याशी बोलायला सांग.’’ तिने प्रेमाने शुभीच्या गालावर ओठ टेकवत म्हटलं. शुभी खुदकन् हसली.

सकाळी शुभीला उठवावं लागलं नाही. स्वत:च उठली, आवरून सरळ आईजवळ स्वयंपाकघरात आली. गळ्यात हात घातले. गालाचा मुका घेतला. पुन्हा तेच खुदकन् हसणं. आईने दिलेले पैसे व्यवस्थित कंपास बॉक्समध्ये ठेवले अन् टाटा करून शुभी घराबाहेर पडली.

शुभीची सणसणीत उंची अन् गालावरच्या खळ्या…हुबेहूब वसंतची कार्बन कॉपीच जणू. आधी किती दिवस लग्न होतंय की नाही ही काळजी. त्यानंतर दोन वर्षांनी तिला दिवस गेले. वसंतला मूल नको होतं. पण सुमा आपल्याच आनंदात दंग होती.

वसंतच्या छातीवर डोकं टेकवत ती म्हणाली होती, ‘‘मला मुलगाच हवाय, तुझ्यासारखा.’’

‘‘अन् मुलगी झाली तर?’’

‘‘नाही, मुलगाच होईल.’’

‘‘लोक म्हणतात, ‘पहिली बेटी, धनाची पेटी’ अन् तू मुलगा हवा म्हणतेस?’’

‘‘हो, मला पहिला मुलगाच हवाय…’’

‘‘पहिला म्हणजे? अजून यानंतर एक मुलगी हवीय? महागाई इतकी आहे अन्…’’ वसंतची ठराविक बडबड सुरू झाली.

‘‘कमालच करतोस. अरे आयतं घर तुला राहायला मिळालंय. घरात सगळ्या वस्तू, सगळं सामान आहे. आता तुला काय मुलं पोसायचीही ऐपत नाही का? तुला मुलंच आवडत नाहीत का? महागाईत काय लोक मुलं जन्माला घालत नाहीत का?’’ तिला संताप यायचा. वसंतचं गप्प बसणं असह्य व्हायचं.

वसंतला तिने प्रथम बघितलं ते शाळेच्या कॅण्टीनमध्ये. शाळेच्या कॅम्पसमध्ये ते कॅण्टीन होतं. उंच, रुबाबदार बांधा, गव्हाळ कांती, मोठमोठे डोळे. पॅण्टच्या खिशात हात घालून तो बेदकारपणे इकडेतिकडे बघत उभा होता.

कॅण्टीनच्या एका कोपऱ्यात उभी राहून ती अगदी अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे बघत होती. कोवळं वय…कुणाचंही आकर्षण वाटावं असं अडनिड वय, चुंबकाकडे आकर्षित व्हावं तशी ती त्याच्याकडे ओढली गेली होती. रमा कधीची तिच्याजवळ येऊन उभी होती, पण सुमाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. रमाने तिला जोरदार चिमटा काढला तेव्हा ती दचकून ओरडली.

तिच्या ओरडण्यामुळे वसंताने मान वळवून तिच्याकडे बघितलं. दृष्टिभेट झाली अन् तो हसला. त्याच्या गालावरच्या खळ्यांमध्ये ती अशी हरवली की तिला स्वत:चा शोधा लागेना.

दुसऱ्या दिवशी तिच्याही नकळत की पुन्हा त्याच कॅन्टीनकडे वळली. वसंत आजही तिथे होता पण कालच्यासारखा नाही तर तिची वाट बघत असल्यासारखा. त्यानंतर भेटी ठरवून होऊ लागल्या. हॉस्टेलमधून फक्त शनिवारी बाहेर पडायला परवानगी होती. तेव्हा ती दोघं भेटायची. हॉस्टेलची वॉर्डन तरुणच होती. फारशी बंधनं लादत नव्हती.

सुमा शनिवारची आतुरतेने वाट बघायची. खूप नटायची, छान दिसायचा प्रयत्न करायची. हातात हात घालून दोघं याच रस्त्यावरून लांबपर्यंत फिरायला जायची. ते गुलमोहर तिच्या प्रेमाचं साक्षीदार होतं. वसंतच्या बाहुपाशात ती सगळं जग विसरायची. त्याच्या आधारावर ती कुठल्याही संकटाशी भिडायला तयार होती.

शाळेचे दिवस आता संपत आले होते. पुन्हा अलवरला राजस्थानात परत जावं लागणार होतं. सुमाचे आईवडील बरेच आधी अपघातात दगावले होते. तिची सगळी जबाबदारी मोठी बहीण हेमाताई व मेहुणे रतन भावोजींवर होती.

‘‘वसंत काही तरी केलं पाहिजे. मला परत जायचं नाहीए. इथेच राहायचं आहे,’’ ती रडतच बोलली.

‘‘तू रडू नकोस. काही तरी मार्ग निघेल. अन् अजून बरेच दिवस आहेत. मी तरी बरा तुला जाऊ देईन?’’

बारावीचा निकाल येऊ लागला होता. तेवढ्यात बारावीच्या मुलांमुलींसाठी ज्यूनियर कॉलेजाने उन्हाळी सुट्टीत हॉबी क्लासेस सुरू केले होते. तीच संधी सुमाने साधली. हॉबी क्लासमुळे गावी जाणं टाळता आलं.

बारावीचा निकाल चांगला लागला. वसंतने झकास पार्टी दिली.

‘‘मला अजूनही काहीतरी हवंय.’’ त्याच्या डोळ्यांत बघत ती धिटाईने बोलली.

‘‘बोल ना?’’ कपाळावर आलेले तिचे केस बोटाने बाजूला करत वसंतने म्हटलं.

‘‘मला इथून जाऊ देऊ नकोस. मला तुझ्याजवळच राहायचं आहे.’’

‘‘प्रॉमिस! तुला कुठेही जाऊ देणार नाही.’’

स्कूल कॉलेजच्या हॉस्टेलमधून वसंतने तिला एका दुसऱ्या हॉस्टेलमध्ये शिफ्ट केलं. एक प्रौढ ख्रिश्चन महिला ते हॉस्टेल चालवायची. जवळच फॅशन इन्स्टिट्यूट होती. रमाची बहीण तिथे कोर्स करत होती. बी.ए.चा अभ्यास प्रायव्हेट करायचा अन् फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा असा कार्यक्रम ठरला. आता इथे राहाण्याचं भक्कम कारण हेमाताई आणि भावोजींना सांगता येणार होतं.

हॉस्टेलच्या रूमवर हेमाताई तिला राग भरत होती. ‘‘वेड लागलंय तुला? का राहायचं आहे इथे? आहे तरी काय एवढं? तुझ्या हट्टामुळे तुझं स्कूलिंग इथे केलं. यांना तर तू आमच्याकडे राहून शिकावं असं वाटत होतं. एवढे दिवस ऐकून घेतलं त्यांनी, पण आता नाही हं ते ऐकून घेणार. त्यांनी तर एक छानसा मुलगाही बघून ठेवलाय तुझ्यासाठी. कमावता, देखणा, चांगल्या घराण्यातला. तू बी.ए झाल्याझाल्या लग्न करणार आहोत तुझं आमची जबाबदारी आहे गं ती. आम्हालाही काळजीतून मोकळं कर गं बाई!’’

हेमाताई चिडलेली होती. सुमा मान खाली घालून मुकाट्याने ऐकून घेत होती. लहानपणापासून ती असंच करायची. कधी वाद घातला नाही, दुरुत्तरं केली नाहीत. बस्स, गप्प राहूनच आपल्याला काय हवं ते करून घ्यायची. आत्ताही तेच झालं, शेवटी हेमाताई मुकाट्याने परत गेली. पण रमा अन् तिच्या घरच्यांनी ‘‘आम्ही सुमाची काळजी घेऊ’’ म्हणून तिला आश्वस्त केलं होतं. हॉस्टेलची मालकीण विलियमनेही तिला ‘‘काळजी करू नका. मी लक्ष ठेवते तिच्यावर,’’ म्हणून सांगितलं होतं.

हेमाताईने जाताजाता शंभर सूचना केल्या होत्या. ती गेली अन् आठ दिवसांत भावोजी आले. ते नाराज होते. पण तिच्या राहाण्याजेवण्याची हॉस्टेलच्या फीची, कॉलेजच्या फीची सर्व व्यवस्था जातीने लावून गेले. सुमाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली होती.

काळ पुढे सरकत होता. सुमाला हा कोर्स खूप आवडला होता. तिचा जीव त्यात रमत होता. बी.ए.चा अभ्यासही सुरूच होता. दोन वर्षं बघता बघता संपली. बी.ए.चं शेवटचं वर्षं अन् फॅशन डिझायनिंगचंही शेवटचं वर्षं…त्यानंतर?

एका सायंकाळी बागेत फिरता फिरता तिने वसंतला विचारलं, ‘‘आपण लग्न कधी करायचं? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न करण्याचा विचारही मी करू शकत नाही.’’

inside-pic

वसंतने उत्तर दिलं नाही.

‘‘काही तरी बोल, मला भीती वाटायला लागली आहे.’’

‘‘हो गं बाई, होईल सगळं,’’ बेपर्वाईने वसंत उत्तरला.

‘‘आयुष्यभर काय मी शिकतंच राहीन का? हेमाताईला लक्षात आलंय. आपल्याला लग्न करावं लागेल. ताई आली की तू बोल तिच्याशी.’’

ती आशाळभूतपणे त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. तो गप्प होता. चेहराही मख्ख!

‘‘ताई पुढल्या महिन्यात येतेय. मी तिच्याबरोबर परत जावं असं तिला वाटतंय. तिचं म्हणणं पेपर देण्यापुरतंच इथे यावं… तू यावेळी तिच्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलशील का?’’ तिने गळ घातली.

‘‘बघूया…घाई काय आहे? तू आधी आपला अभ्यास पूर्ण कर.’’ वसंत टाळण्याच्या मूडमध्ये होता. ती चिडली. बराच वेळ दोघंही गप्प होती. मग वसंतने तिला आपल्याजवळ ओढून घेतली. त्याच्या उष्ण स्पर्शाने ती लोण्यासारखी विरघळली. तो विषय तिथेच संपला.

‘‘उद्याच येतेय हेमाताई अन् तुला नेमकं आत्ताच बाहेर जावं लागतंय? खरंच काम आहे की तू तिला भेटणं टाळतो आहेस?’’ ती जोरजोरात रडायला लागली.

वसंतने तिला जवळ घेऊन समजावलं. तिला गप्प केलं. ‘‘माझ्यावर विश्वास ठेव, मी पुढल्या वेळी नक्की तुझ्या ताईला भेटतो,’’ वगैरे गोड गोड बोलून शेवटी तिला स्वत:च्या मनाप्रमाणे राजी केलं. पुन्हा हेमाताईच्या सरबत्तीला उत्तरं द्यायला ती एकटीच उभी होती.

यावेळी तर ती हेमाताईशी खूप काही खोटं बोलली. आयुष्यात प्रथमच खोटं बोलणं, तेही आईसारख्या हेमाताईशी. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. हेमाताईही कधी नव्हे ती खूप चिडली. या पोरीचं कसं होणार या काळजीने काळवंडून हेमाताई निघून गेली आणि सुमा धाय मोकलून रडू लागली. काही तरी मनात सलत होतं. कुठे तरी काही तरी खटकत होतं.

विलियमने प्रेमाने तिच्या खांद्यावर, डोक्यावर थोपटलं, ‘‘तू तुझ्या ताईला वसंतबद्दल सांगत का नाहीस?’’ तिने म्हटलं. वसंत अन् सुमाचं प्रकरण विलियमला ठाऊक होतं. इतक्या दिवसात प्रथमच तिने त्याबद्दल बोलून दाखवलं होतं.

‘‘खरं म्हणजे वसंतने हे तिला सांगायला पाहिजे.’’ सुमाला पुन्हा रडू फुटलं.

‘‘तो तुझ्या बहिणीला भेटत का नाही? का टाळतोय? हे बघ, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू त्याला अगदी स्पष्ट विचार,’’ विलियम याहून अधिक काही बोलली नाही पण प्रश्नांच्या गुंत्यात सुमाला मात्र अडकवून गेली.

आठ दिवसांसाठी बाहेर जायचंय म्हणून सांगून गेलेला वसंत दुसऱ्याच दिवशी परत आला. वसंतला बघून ती आनंदली. पण प्रथमच तिला त्याचं वागणं खूप खटकलं. इतक्या लवकर परत आलाय तर एक दिवस नंतरही जाऊ शकला असता ना? निदान ताईला भेटला असता. पण वसंतने जणू तिच्यावर जादू केली होती. ती त्याला काहीही म्हणू शकली नाही.

फायनल परीक्षाही येऊन ठेपली. अभ्यासाचा ताण अन् काळजी होतीच पण त्यापेक्षाही अधिक काळजी होती ती वसंतच्या बेपर्वाईची. लग्नाच्या बाबतीत तो काहीच बोलायला तयार नव्हता. सुमाला खात्री होती, इथून ती घरी गेली की तिचं लग्न होईल हे नक्की. तिला वाटे, वसंतनेच होऊन लग्नाचा विषय काढावा अन् तिने जसं स्वत:विषयी सगळं सांगितलं आहे तसं त्यानेही मोकळेपणाने तिला सांगावं. पण तसं होत नव्हतं.

एकदा गुलमोहराच्या झाडाखाली तिने वसंतला म्हटलं होतं, ‘‘आता लवकरच मी इथून परत जाईन. तुला माझी आठवणही येणार नाही.’’

‘‘काय एकसारखं जाण्याचंच रडगाणं गात असतेस? म्हटलं ना, काही तरी करतो म्हणून?’’ वसंत तिरसटला.

‘‘तू काहीही करणार नाहीएस. अन् आता तर मीही काही करणार नाहीए.’’ ती हसली.

‘‘लग्न केलं नाही तर प्रेम खोटं ठरतं का? अगं, लग्न म्हणजे वैताग असतो. लग्न केल्यावर म्हणशील, ‘आधीच आपण बरे होतो,’ ’’ वसंत गळ्यात हात घालून म्हणाला.

‘‘तुला कसं माहीत लग्न म्हणजे वैताग असतो म्हणून? अशी किती लग्न केली आहेत तू?’’

वसंतने डोळा मारत म्हटलं, ‘‘फार नाही, चार-पाच लग्न केलीएत.’’

‘‘वसंत, प्लीज मला स्पष्ट काय ते सांग,’’ बोलता बोलता तिला रडू कोसळलं.

तिचे अश्रू पुसत वसंत निर्विकारपणे म्हणाला, ‘‘माझ्याजवळ काहीही नाहीए. घर नाही, पैसे नाहीत, कामधंदा नाही. लग्न केलं तरी तू माझ्याबरोबर राहाशील कशी?’’

‘‘राहीन मी, फक्त तू लग्नाला हो म्हण. माझ्या आईवडिलांची जी प्रॉपटी आहे ती आम्हा दोघी बहिणींची आहे. लग्नानंतर माझा वाटा मला मिळेल. आपण त्यातून घर घेऊ. तुझ्या धंद्यालाही भांडवल होईल.’’

वसंत मुकाटपणे सगळं ऐकत होता. शेवटी त्याने लग्नाला होकार दिला.

विचारांच्या नादात ती ऑफिसला कधी पोहोचली तेही तिला कळलं नाही.

नेहमीचंच आहे हे. मनात नसतानाही ती भूतकाळात भरकटत जाते. ऑफिसात पाय ठेवल्या ठेवल्या तिथला शिपाई धावतच तिच्याकडे आला, ‘‘मॅडम, आज सकाळपासूनच खूप लोकांची धुलाई केलीय सरांनी. तुमचीच वाट बघताऐत ते.’’

तिने पर्स आपल्या टेबलाच्या खणात टाकली अन् ती मेजर आनंदच्या केबिनकडे वळली.

‘‘मे आय कम इन, सर?’’

‘‘येस, प्लीज,’’

‘‘सर, तुम्ही बोलावलंत?’’

‘‘बसा…’’ मेजर आनंद म्हणाले, ‘‘दिवाण असोसिएशनच्या पेमेण्टचा चेक त्यांना मिळाला नाहीए, ही पहिली गोष्ट अन् दुसरं म्हणजे स्टोअरमघल्या डाळींचा स्टॉक जवळ जवळ संपला आहे.’’

‘‘सॉरी सर, असं व्हायला नको होतं. पण आज मी जातीने लक्ष देऊन सगळं व्यवस्थित करून घेते,’’ ती हळू आवाजात म्हणाली.

‘‘ठीक आहे, संस्थेचं काम व्यवस्थित व्हायलाच हवं, यासाठी सांगितलं. बरं मी बोललो होतो, त्यावर काही विचार केलात का?’’ मेजर तिच्याकडे बघत बोलले.

तिला उत्तर सुधरेना, ‘‘मी विचार करून सांगते, सर,’’ एवढं बोलून ती आपल्या टेबलाशी आली अन् कामाला लागली.

फायलीचं काम पूर्ण करून स्टोअरमध्ये गेल्यावर लक्षात आलं की डाळींखेरीज इतरही अनेक गोष्टी संपत आल्या आहेत. मन लावून ती कामं आटोपत होती. लंच टाइम झाला अन् आपण डबा आणलेला नाही हे तिला आठवलं. संस्थेच्या केबिनमध्ये चहा अन् ब्रेडरोल ऑर्डर करून ती टेबलाशी येऊन बसली. मेजर आनंदही बरेचदा कॅण्टीनमध्ये लंच घ्यायला यायचे. जवळच त्यांची इन्स्टिट्यूट होती. तिथे मुलामुलींना लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभं राहून आयुष्य जगता येईल असे कोर्सेस शिकवले जात होते. गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण दिलं जायचं. पैसे देऊन शिकणाऱ्यांना आपण दिलेल्या पैशाचं सार्थक झालंय असं वाटायचं. संस्थेचा पैसा सत्कार्यातच खर्च होईल याकडे मेजर जातीने लक्ष द्यायचे. संस्थेला सरकारी मान्यता होती. त्याखेरीज शेतकरी, कुटीर उद्योग करणारे कारागीर या लोकांचा माल वाजवी किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते जागोजागी ट्रेड फेअर भरवत असत. स्वच्छ चारित्र्य आणि त्यांचा पारदर्शक आर्थिक कारभार यामुळे समाजातही त्यांना मान होता. त्यांची बायको व दोन मुलं एका कार अपघातात दगावली. त्यानंतर त्यांनी लष्कराची नोकरी सोडली व आपली कोट्यवधी रुपयांची पिढीजात प्रॉपटी विकून ही संस्था व इतर सामाजिक उपक्रम सुरू केले असं सुमा ऐकून होती.

इथली नोकरी सुरू केली तेव्हा आपण इथे किती काळ टिकून राहू याबद्दल सुमा साशंक होती. कारण लष्करातली माणसं फार कडक शिस्तीची असतात हे ती ऐकून होती. मेजर आनंद होतेही तसेच. पण हळूहळू तिला इथलं काम, इथली शिस्त सगळं आवडायला लागलं, अंगवळणीही पडलं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण इथे जे काम करतो त्यातून अनेक गरजू लोकांना मदत होते. अनेक होतकरू मुलांचा भविष्यकाळ घडतो अन् किती तरी स्त्रिया स्वावलंबी होतात ही गोष्ट फारच समाधान देणारी होती. तिला आठवलं, सकाळी तिला मेजर आनंदने जवळच भरणाऱ्या ट्रेफेअरमध्ये चलण्याबद्दल विचारलं होतं अन् तिने विचार करून सांगते म्हणून त्यांना म्हटलं होतं. यापूर्वीही ती जवळपासच्या टे्रड फेअरमध्ये टीमसोबत गेली होती. पण सकाळी जाऊन सायंकाळी परत आली होती. पण यावेळी दोनतीन दिवस तिथेच थांबावं लागणार होतं.

अशावेळी नेहमीच तिचं उत्तर नकारार्थी असायचं पण यावेळी मात्र तिलाच थोडा बदल हवा असेल किंवा रूटीनमधून ब्रेक हवासा वाटला म्हणून तिने जाण्याचा निर्णय घेतला. दुपारची कॉफी घेतली अन् ती सरळ मेजर आनंदच्या केबिनमध्ये गेली.

‘‘सर, कधी निघावं लागेल?’’

मेजरने हसून तिच्याकडे बघितलं अन् म्हटलं, ‘‘या संपूर्ण महिन्यात जेव्हा तुम्हाला सोयीचं असेल त्याप्रमाणे जाता येईल.’’

ती परत आपल्या टेबलाशी येऊन कामाला लागली. कामं संपवून घरी जाताना ट्रेड फेअरचाच विचार मनात होता. चहा वगैरे घेतल्यावर तिने कपाट उघडलं. इतक्या वर्षांत हौशीने, आवडीने काही घालणं तिने बंदच केलं होतं. फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय हेही ती विसरली होती. तिला हसायला आलं. मन शांत, आनंदी अन् थाऱ्यावर असायला हवं ना? मनच शांत नाही तर देहाची शुद्ध तरी कशी राहाणार? ती अंथरुणावर पडली अन् तिच्याही नकळत पुन्हा भूतकाळात शिरली.                                     (क्रमश 🙂

विश्वास आहे तुझ्यावर

कथा * अंजू साखरे

‘‘दिल धडक धडक के कह रहा है आ भी जा…’’ गाण्याची रिंग टोन ऐकून मृदुला आपला फोन उचलायला स्वयंपाकघरातून ड्रॉइंगरूममध्ये धावली. नाव येत नव्हतं. पण जो नंबर दिसत होता, तो बघून तिच्या हृदयाची धडधड वाढली. हा नंबर तिला झोपेतून उठवून कुणी विचारला तरी ती तोंडपाठ म्हणून दाखवू शकली असती.

आपल्या खोलीतून रोहन ओरडला, ‘‘आई, तुझा फोन वाजतोय…’’

मृदुलानं झटकन् फोन उचलला. पटकन् टीव्ही बघत असलेल्या नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकला. दुसऱ्याच क्षणी खोलीत अभ्यास करत असलेल्या लेकाकडे एक दृष्टीक्षेप टाकून तिनं फोन कानाला लावत बाल्कनी गाठली.

‘‘हॅलो…हाय…काय चाललंय?’’

‘‘आता बरं वाटतंय,’’ पलीकडून आवाज आला.

‘‘का? काय झालं होतं?’’ तिनं विचारलं.

‘‘बस्स, तुझा आवाज ऐकला…माझा दिवस सत्कारणी लागला.’’

‘‘असं होय? बरं पण एक सांग, आज शनिवारी माझा नवरा ऋषी अन् मुलगा रोहन दोघंही घरी असतात हे ठाऊक आहे ना? मला मोकळेपणानं बोलता येत नाही,’’ घाईघाईनं मृदुला म्हणाली.

‘‘मी तर फक्त एवढं सांगायला फोन केला होता की आता मला अधिक संयम ठेवता येणार नाही. मी पुढल्या आठवड्यात दिल्लीला येतोय…तुला भेटायला. प्लीज एखाद्या हॉटेलात माझं बुकिंग करून ठेव ना? तिथल्या रूममध्ये फक्त तू, मी अन् एकांत असेल,’’ सिद्धार्थ म्हणाला.

‘‘हॉटेल? छे रे बाबा…मी नाही हॉटेलात येणार भेटायला.’’

‘‘तर मग आपण भेटायचं कुठं? मी एवढा १५०० किलोमीटर मुंबई ते दिल्ली अंतर ओलांडून तुला भेटायला येतोय अन् तुला हॉटेलपर्यंत यायला जमणार नाही?’’

मृदुला बोलण्यात गुंतली होती. मागे रोहन कधी येऊन उभा राहिला हे तिला कळलंच नाही.

रोहनकडे दृष्टी जाताच ती घाईनं म्हणाली, ‘‘मी नंतर फोन करते,’’ फोन बंद करून ती आत वळली.

‘‘कुणाचा फोन होता आई?’’ रोहननं विचारलं.

‘‘तो…तो माझ्या मैत्रीणीचा होता,’’ तिनं फोन उचलला अन् ती स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरू लागली.

तिचे हात तिथं काम करत होते पण मन मात्र मुंबईला पोहोचलं होतं…सिद्धार्थपाशी. गेली तीन चार वर्षं ती त्याच्याशी ऑनलाइन चॅटिंग अन् फोनवर संभाषण करत होती. तिलाही त्याला भेटायची खूप उत्सुकता होती. आता तो भेटायला यायचं म्हणतोय तर कुठं भेटायचं?

आयुष्यात कोण, केव्हा, कुठं, कुठल्या वळणावर भेटेल सांगता येत नाही. त्यातून कुणीतरी अनोळखी इतका जवळचा वाटायला लागतो की आपले सगळेच परके वाटायला लागतात.

तशी मृदुला खरं तर सुखी होती. प्रेम करणारा नवरा, हुशार, गुणी मुलगा अन् संपन्न आयुष्य…मजेत सुरू होतं. पण एकदा सिद्धार्थ ऑनलाइन फ्रेंड म्हणून तिच्या आयुष्यात आला अन् सगळंच उलटंपालटं झालं.

ती नवरा अन् मुलगा दोघांपासून चोरून कॉम्प्युटरवरून बरेच मेल अन् चॅट करायची. फोनही खूप करायची. जोपर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट ती सिद्धार्थबरोबर शेयर करत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नसे. न बघितलेल्या सिद्धार्थनं तिचं आयुष्य व्यापून टाकलं होतं. मैत्री आता अशा स्थितीत होती की एक दिवस जरी सिद्धार्थबरोबर बोलली नाही तरी ती वेडीपिशी व्हायची. रोजचा फोन हे आयुष्यातलं परम कर्तव्य झालं होतं. तिच्याचसारखी अवस्था मुंबईत सिद्धार्थचीही झाली होती.

घरकाम आटोपून, नवरा ऑफिसला अन् मुलगा शाळेला गेल्यावरच ती फोन करायची किंवा चॅट करायची. पण कधी तरी रोहन गूगलच्या हिस्ट्रीत जाऊन अनेकदा प्रश्न विचारायचा की, ‘‘मम्मी हा सिद्धार्थ कोण आहे?’’ त्यावेळी ती अगदी बेधडक म्हणायची, ‘‘ठाऊक नाही.’’

तरीही हल्ली रोहनला थोडी शंका येत होती की आई त्याच्यापासून काहीतरी लपवते आहे. काही वेळा तो चिडून किंवा कधी सहजपणेही आपला आक्रोश व्यक्त करायचा. पण फार जास्त काही विचारू किंवा बोलू शकत नव्हता.

आता सिद्धार्थ येऊ घातलाय. त्याला भेटायची इच्छा मनातून काढून टाकायची की त्याला भेटायला हॉटेलात जायचं? काय करावं या विचारानं तिच्या डोक्याचं भुसकट झालं होतं.

मग अचानक तिनं एक निर्णय घेतला अन् सिद्धार्थला फोन लावला, ‘‘सिद्धार्थ, आधीच मी तुला खूप सावधगिरीनं, खरं तर घरातल्यांना चोरून, त्यांना घाबरून अगदी भीतभीत फोन लावत होते. पण आता मला या भीतिचा, या चोरटेपणाचा वीट आलाय. मला असं चोरून मारून, घाबरून जगायचं नाहीए. असं बघ, आपले संबंध मैत्रीचे आहेत. माझ्या मनात कुठलीही वाईट भावना नाही, तुझ्याही मनात नाही…तर मग आपण का घाबरायचं? तू सरळ माझ्या घरी ये. मी तुला हॉटेलात भेटायला येणार नाही अन् तुला भेटायचीही संधी मला सोडायची नाहीए.’’

मृदुलाचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थ चांगलाच गडबडला. ‘‘वेड लागलंय का तुला? तुझा नवरा अन् तुझा रोहन…त्यांना काय वाटेल? छे छे हे बरोबर नाही.’’ ‘‘काय बरोबर नाही? हे घर माझंही आहे. इथं मी माझ्या मर्जीनं माझ्या माणसांना बोलावू शकते. माझ्या मनात कुठलंही पाप नाही, मी तुझ्याशी मैत्री केलीय, यात वाईट किंवा कुणी आक्षेप घ्यावा असं काय आहे? अजून मी रोहन किंवा ऋषीशी याबाबतीत बोलले नाहीए, पण जर त्यांना हे मान्य नसेल तर आपण हे संबंध कायमचे संपवून टाकू…पण…त्यापूर्वी मला तुला एकदा भेटायचं आहे. फार इच्छा आहे तुला बघण्याची, प्रत्यक्ष बसून गप्पा मारण्याची…येशील ना माझ्या घरी? एकदाच?’’ मृदुलानं मनातलं सर्व बोलून टाकलं.

‘‘मला विचार करायला थोडा वेळ दे…’’ तो गंभीरपणे म्हणाला.

‘‘का? घाबरलास? मारे म्हणायचास, तुझ्या एका बोलावण्यावर धावत येईन…आता काय झालं? कळलं मला तुझं मन स्वच्छ नाही. तुझ्या मनात पाप आहे. मला हॉटेलमध्ये बोलावून तुला माझा गैरफायदा घ्यायचाय,’’ मृदुलाचा आवाज नकळत चढला होता.

‘‘पुरे…कळलं मला,’’ सिद्धार्थ म्हणाला, ‘‘तर मी २० तारखेला बाराच्या फ्लाइटनं दिल्लीला पोहोचेन. ती सायंकाळ तुझ्यासाठी अन् तुझ्या कुटुंबासाठी दिली…पण एक सांग, ऋषी मला मारणार नाही ना?’’

‘‘ठिक आहे, मी वाट बघते,’’ एवढं बोलून मृदुलानं फोन कट केला.

मृदुलानं त्याला बोलावलं खरं, पण मात्र तिला कळेना की ऋषी अन् रोहनशी सिद्धार्थची ओळख काय म्हणून अन् कशी करून द्यायची?

ऋषी एकवेळ समजून घेईल पण अडनिड्या वयाच्या रोहनला आईचा अवचित झालेला मित्र मान्य होईल का? तो कसा रिएक्ट होईल? तिची काय इभ्रत राहील?

वाट बघण्याचा तो आठवडा एखाद्या परीक्षेच्या काळासारखा कठीण होता. त्या सर्व काळात ती दरक्षणी, अगदी क्षणोक्षणी, पश्चात्ताप करत होती. स्वत:लाच दोष देत होती.

मृदुलाच्या मनांतल्या त्या प्रचंड वादळाची घरात कुणालाही कल्पना नव्हती. या सात दिवसात सिद्धार्थला प्रत्यक्ष भेटण्याची प्रबळ इच्छा, मनातल्या सतत धाकासाठी, आता काय होईल या काळजीच्या ओझ्याखाली गतप्राय होण्याच्या मार्गावर होती. प्रत्यक्ष भेटण्याची आतुरता किंवा ओढ यापेक्षाही २० तारखेला सगळं कसं ठीकठाक पार पडतंय याचंच टेन्शन फार होतं.

रोज सकाळी उठताना मनांत पहिला विचार असायचा की ऋषी अन् रोहननं तिला सांगावं की वीस तारखेला त्यांचा काहीतरी कार्यक्रम बाहेर ठरलाय अन् ते दोघं त्यादिवशी घरी असणार नाहीएत, म्हणजे ती निर्धास्तपणे सिद्धार्थला घरातच भेटू शकेल.

पण तसं त्या आठवडाभरात काहीच घडलं नाही. शेवटी वीस तारीख उजाडली. या काळात तिचं सिद्धार्थशी बोलणंच झालं नव्हतं. एकोणीस तारखेची संपूर्ण रात्र ‘उद्या काय घडेल’ या काळजीतच कूस बदलत संपली.

मनात आलं त्याला कळवावं, येऊच नकोस…पण आता ते शक्य नव्हतं. बाण धनुष्यातून सुटला होता.

आपण कुठल्या विश्वासाच्या बळावर हे धाडस केलं ते मृदुलाला कळत नव्हतं. मुंबईहून दिल्लीला त्याला भेटायला बोलावलं…घरात सगळं शांत होतं. जो तो आपापल्या खोलीत, आपापल्या कामात होता.

बरोबर तीन वाजता सिद्धार्थचा फोन आला, ‘‘मी दिल्ली एअरपोर्टला पोहोचलोय.’’

मृदुलाचे डोळे आनंदांने चमकले. हृदय धडधडू लागलं अन् उत्तेजित झाल्यामुळे चेहरा आसक्त झाला.

‘‘एकदा पुन्हा विचार कर…कुठं तरी बाहेरच भेटूयात?’’ सिद्धार्थनं विचारलं.

‘‘नाही. आता माघार घ्यायची नाही, जे होईल ते बघून घेईन,’’ मृदुलानं म्हटलं. मग त्याला मेट्रोचा मार्ग समजावून घरी कसं पोहोचायचं ते सांगितलं. लगेच फोन बंद केला.

अन् मनातली धाकधूक वाढल्यामुळे तिचे हातपाय गार पडले. ऋषी अन् रोहन आपापल्या रूममध्ये होते. डोअर बेल वाजली. धडधडत्या हृदयानं, थरथरत्या हातानं तिनं दार उघडलं. दारात एक उंच, सावळा, देखणा, साधारण चाळीशीच्या आतला तरूण उभा होता. त्याला बघून ती चकित झाली, भांबावली.

‘‘हाय.’’

तो परिचित हाय ऐकून सुखावली अन् कोरड पडलेल्या घशानं बोलली, ‘‘हाय..ये ना, आत ये.’’

जरा बिचकतच सिद्धार्थ दारातून आत आला. तेवढ्यात रोहन झटकन् आपल्या खोलीतून बाहेर आला.

‘‘हा रोहन…आणि रोहन, हे सिद्धार्थ अंकल.’’

कशीबशी तिनं ओळख करून दिली. रोहनही थोडा भांबावला. पटकन् नमस्कार करून आपल्या खोलीत निघून गेला.

आपल्या मनांतील भीती अन् अस्वस्थता चेहऱ्यावर दिसू न देता हसून तिनं सिद्धार्थकडे बघितलं अन् त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं.

ऋषीच्या खोलीत टीव्ही चालू होता. बाकी सगळं शांत होतं. ऋषी टीव्हीपुढे बसला होता. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, ‘‘जरा बाहेर येता का? कुणी आलंय?’’

‘‘कोण आलंय?’’

‘‘सिद्धार्थ.’’

दचकून ऋषीनं विचारलं, ‘‘कोण सिद्धार्थ?’’

‘‘माझा मित्र.’’ तिनं सांगून टाकलं. आता ती कोणत्याही परिणामाला सामोरी जायला तयार होती. ऋषीनं तिला घराबाहेर काढलं तरी तिची तयारी होती पण अर्थात्च ती सिद्धार्थबरोबर जाणार नव्हती. तो तिचा मित्र होता. आयुष्याचा जोडीदार थोडीच होता?

ऋषी दहा मिनिटं तसाच बसून राहिला. मृदुला स्वयंपाकघरात जाऊन कॉफी करायला लागली. त्या आधी तिनं सिद्धार्थला पाणी आणून दिलं. अधूनमधून ती त्याच्याशी बोलतही होती.

रोहन स्वयंपाकघरात आला आणि ‘‘मी बाहेर जातोय,’’ म्हणून झटकन् सांगून निघूनही गेला.

कॉफी बनवून मृदुला ट्रे घेऊन बाहेर आली, तेव्हा ऋषी खोलीतून बाहेर आला अन् सिद्धार्थशी शेकहॅन्ड करून त्याच्या शेजारी सोफ्यावर बसला. मृदुलाला मनातून खूप भीती वाटली. पण एक दिलासाही होता. त्यांच्यातले थोडेफार मतभेद कधी झाले तरी ते बेडरूमबाहेर आले नाहीत. तेवढा सुसंस्कृतपणा त्याच्याकडे होता. मुख्य म्हणजे त्यांचा परस्परांवरचा विश्वास अन् आपसातलं सामंजस्यही खरं तर वाखणण्यासारखंच होतं. ऋषी अगदी मोकळेपणानं बोलत असल्यामुळे शांत झाला. अवांतर गप्पा, थोडीफार एकमेकांची चौकशी, जुजबी ओळख यादरम्यान ऋषीनं मृदुलाला म्हटलं, ‘‘ही कॉफी वेलकम ड्रिंक म्हणून घेतोय आम्ही. फ्रीजमध्ये रसमलाई अन् ढोकळा आहे हे ठाऊक आहे ना?’’ मृदुला दचकली. तिला हे अपेक्षित नव्हतं.

थोडा वेळ बसून ऋषी आत निघून गेला. मृदुला व सिद्धार्थ आता चांगलेच सावरले होते. शांतपणे गप्पा मारत होते. मृदुलाही आत्मविश्वासानं वावरत होती. थोड्याच वेळात रोहन आला आणि सरळ स्वयंपाकघात गेला. जाताना आईला, ‘‘आत ये.’’ म्हणून गेला.

रोहन गरमागरम सामासे अन् जिलेबी घेऊन आला होता. आश्चर्यानं मृदुला त्याच्याकडे बघतच राहिली.

‘‘आई, तुझ्या फ्रेंडसाठी. माझे मित्र येतात तेव्हा तूही किती काय काय करतेस ना? म्हणून तुझ्या आवडत्या दोन्ही गोष्टी मी तुझ्या मित्रासाठी आणल्या आहेत. तुलाही हक्क आहेच गं मित्र असण्याचा, मैत्री करण्याचा.’’

त्यानं तिला बशा भरायलाही मदत केली. रसमलाई, ढोकळा, जिलेबी, सामोसे अन् त्यानंतर पुन्हा कॉफी…

सुमारे तीन तास थांबून सिद्धार्थ आठच्या फ्लाईटनं परत मुंबईला निघून गेला.

तो निघून गेला अन् मृदुलाला एकदम भीती वाटली. ऋषी आता काय रिअॅक्शन देणार? भीतीमुळे ती त्याच्यासमोर जाणंही टाळत होती.

रात्रीची जेवणं आटोपली. ती झोपण्याठी खोलीत आली, तेव्हा ऋषीनं विचारलं, ‘‘सिद्धार्थ गेला?’’

‘‘हो, गेला.’’

‘‘तुझा खरा मित्र दिसतोय…इतक्या लांबून फक्त तुला भेटायला आला.’’

‘‘मी एका पुरुषाशी मैत्री केली याचा तुम्हाला राग आला का? मला माझा संसार, माझं घर, नवरा, मुलगा मित्रापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. आज तो आला, आता तुम्ही मला जी शिक्षा सांगाल ती भोगायला मी तयार आहे.’’

‘‘शिक्षा? कसली शिक्षा? तू काही चूक किंवा गुन्हा थोडीच केलाय? मला तर आठवड्यापूर्वीच माहीत होतं की तुझा मित्र येणार आहे.’’

मृदुला दचकली. तिनं विचारलं, ‘‘तर मग तुम्ही काही बोलला का नाहीत?’’

‘‘हे बघ मृदुला, गेली इतकी वर्ष आपण संसार करतोय. मी तुला ओळखतो. त्यानं म्हटल्याप्रमाणे तू त्याला बाहेरही भेटू शकली असतीस. पण तू त्याला घरी बोलावलंस, आमची ओळख करून दिलीस.’’

कारण मनातून तुला आपल्या नात्याविषयी खात्री होती. माझ्यावर विश्वास होता की मी इतर नवऱ्यासारखा नाही. बायकोला समजून घेतो अन् मैत्री तर कुणाची कुणाशीही होऊ शकते. आठवड्यापूर्वी तू त्याला घरी यायचं आमंत्रण दिलं. तेव्हाच मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं होतं. चोरून नाही हं…एक तर तुझा आवाजच मोठा होता, चढा होता अन् दुसरं म्हणजे तुझ्या मोबाइलचा स्पीकरही ऑन होता. तू माझ्यावर ठेवलेला विश्वास मलाही जपायलाच हवा होता ना? तुझी घालमेल मला समजत होती…म्हणूनच तुझ्या नकळत मी तुझ्या मित्राच्या स्वागतासाठी रसमलाई अन् ढोकळे आणून ठेवले होते.’’

मृदुलाच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहत होते. ‘‘हो, अजून एक गोष्ट…एक    स्त्री अन् एक पुरूष मित्र असू शकत नाही असे नाही…मी तुझा चांगला मित्र आहे की नाही? अन् दुसरी गोष्ट तू माझी मैत्रीण आहेस, पण मलाही एखादी आणखी मैत्रीण असायला तुझी हरकत नसावी…खरं ना?’’ ऋषीचं हे बोलणं ऐकून मृदुलानं त्याला मिठीच मारली.

उशीरा का होईना

कथा * पूनम औताडे

रात्रीचा एक वाजला होता. स्नेहा अजूनही घरी परतली नव्हती. सविताच्या फाटकापासून घरापर्यंत फेऱ्या सुरू होत्या. ती फार काळजीत होती. पती विनय आपल्या स्टडीरूममध्ये काम करत होते. सविताची बेचैनी त्यांना कळत होती. ते एका मोठ्या फर्ममध्ये सी.ए. होते. काम तसंच ठेवून ते स्टडीरूममधून बाहेर आले. सविताला दिलासा देत ते म्हणाले, ‘‘तू झोप आता…मी अजून जागा आहे. मी बघतो.’’

‘‘झोपू तरी कशी? झोप यायला हवी ना? पोरीला समजावून समजावून थकले…पण तिला समजतच नाही…’’

तेवढ्यात कार थांबल्याचा आवाज आला. स्नेहा कारमधून उतरली. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मुलाशी काहीतरी बोलली…जोरात हसली अन् घराकडे आली. विनय अन् सविताला जागे बघून म्हणाली, ‘‘ओ मॉम, डॅड, तुम्ही अजून जागेच आहात?’’

‘‘तुझ्यासारखी मुलगी असल्यावर झोप कशी येणार? तुला आमच्या तब्येतीचीही काळजी नाहीए का गं?’’

‘‘म्हणून मी काय लाइफ एन्जॉय करणं सोडून देऊ का? ममा, डॅड, तुम्ही बदलत्या काळाबरोबर बदलत का नाही? ‘सायंकाळी सातच्या आत घरात’ असं नसतं हल्ली.’’

‘‘कळतंय मला, पण काळ रात्री दीडपर्यंत बाहेर राहण्याचाही नाहीए,.’’

‘‘तुमचं भाषण ऐकायच्या मूडमध्ये मी नाहीए. उगीचच तुम्ही काळजी करत बसता. आता गुडनाईट,’’ कुठलं तरी गाणं गुणगुणत ती आपल्या बेडरूममध्ये गेली.

सविता आणि विनयनं एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या नजरेत काळजी अन् उदासपणा होता. ‘‘चल, झोपूयात. मी कागदपत्रं आवरून आलोच,’’ विनयनं म्हटलं.

सविताला झोप येत नव्हती. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एकुलत्या एका लाडक्या पोरीला कसं समजवायचं, हेच तिला कळत नव्हतं. सविता स्वत: गावातील एक प्रसिद्ध वकील होती. तिचे सासरे सुरेश रिटायर्ड सरकारी अधिकारी होते. त्या एका घरात मोजून चार माणसं होती. स्नेहाला सगळ्यांकडून प्रेम अन् कौतुकच वाट्याला आलं होतं. खरं तर आईवडिलांनी चांगलं वळण लावलं होतं, पण ती थोडी मोठी होता होता तिचं वागणं बदलत गेलं. ती आत्मकेंद्री झाली. फक्त आपलाच विचार, लाइफ एन्जॉय करणं, अत्याधुनिक वेशभूषा, वागण्यात निर्लज्जपणा…नित्य नवे बॉयफ्रेण्ड, एकाशी ब्रेकअप केला की दुसरा बघायचा. त्याच्याशी नाही पटलं तर तिसरा. पार्ट्यांना जायचं, डान्स करायचा, सेक्स करणं तिच्या दृष्टीनं आधुनिकपणा होता. सविता तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची, पण स्नेहा ऐकून न घेता भांडणं करायची. आईशीही अत्यंत वाईट भाषेत बोलायची. स्नेहा सुरेश आजोबांची फार लाडकी होती. त्यांनीच तिला लंडन स्कूल ऑफ कॉमर्समध्ये पाठवून तिचं शिक्षण केलं होतं. ती आता एका लॉ फर्ममध्ये अॅनालिस्ट म्हणून काम करत होती. सविता अन् विनयचे खूपच घनिष्ठ मित्र होते अभय आणि नीता. ती दोघंही सी.ए. होती अन् त्यांचा मुलगा राहुल वकील होता.

ही दोन्ही कुटुंब खूपच मैत्रीत होती. समान विषय, समान आवडी यामुळे त्यांच्यात अपार जिव्हाळा होता. राहुल अत्यंत गुणी आणि संस्कारशील मुलगा होता. त्याचं खरं तर स्नेहावर प्रेम होतं पण तिची ही बदललेली वागणूक त्यालाही आवडत नव्हती. त्यानं त्याचं प्रेम बोलून दाखवलं नव्हतं. तसं त्यानं तिच्या वागण्यावर पण आपलं मत व्यक्त केलं नव्हतं. स्नेहा मात्र तिला काहीही प्रॉब्लेम आला की सरळ राहुलला फोन करायची. तेवढ्यापुरतीच तिला राहुलची आठवण यायची. तो ही सगळी काम सोडून तिच्यासाठी धावून यायचा.

सविता अन् विनयची इच्छा होती की राहुलशीच स्नेहानं लग्न करावं अन् सुखाचा संसार करावा. पण स्नेहाच्या वागण्यानं ते इतके लज्जित होते की राहुल किंवा अभय नीताकडे हा विषय काढायचं धाडस त्यांना होत नव्हतं. राहुलचं स्नेहावर इतकं प्रेम होतं की तो तिच्या सगळ्या चुकांना क्षमा करत होता. पण राहुलच्या दृष्टीनं प्रेम, आदर, सन्मान, काळजी घेणं, जबाबदारी उचलणं, माणुसकी जपणं या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. मात्र स्नेहाला या शब्दांची किंवा त्यांच्या अर्थाचीही ओळख नव्हती.

भराभर दिवस उलटत होते. स्नेहा आपल्या मर्जीनं घरी यायची. केव्हाही निघून जायची. आईवडिलांच्या रागावण्याचा, बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. त्यात कहर म्हणजे सुरेश आजोबा तिला अधिकच लाडावत होते, ‘लहान आहे. येईल समज?…’ हल्ली ते आजारी असायचे. त्यांचा जीव स्नेहाभोवतीच घुटमुळत असे. आपण आता फार जगणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली सर्व संपत्ती स्नेहाच्या नावे करून दिली.

एका रात्री ते जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. तिघांनाही फार वाईट वाटलं. खूप रडले. कितीतरी दिवस सर्व नातलग येतजात होते. हळूहळू पुन्हा सर्व नॉर्मल झालं. स्नेहालाही आपली लाइफस्टाइल आठवली. तसंही फार काही गांभीर्यानं घ्यावं असा तिचा स्वभाव नव्हता. आता तर आजोबांची सगळी संपत्ती तिच्या हातात आली होती. इतका पैसा बघून तर ती हवेतच तरंगत होती. तिनं आईवडिलांना न सांगता एक कार खरेदी केली.

सविता म्हणाली, ‘‘एवढ्यात गाडी कशाला गं, घेतलीस? आम्हाला निदान विचारायचंस तरी?’’

‘‘मॉम, मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू द्या ना. लाइफ एन्जॉय करायचं आहे. गाडीमुळे मी आता स्वतंत्र आहे. रात्री कुणी सोडेल का ही काळजी नको. मी इंडिपेंडट झाले यात आनंद मानायचा सोडून कटकट काय करताय? आजोबांनी इतका पैसा दिलाय, तर मी आपल्या इच्छेनुसार का जगू नको?’’

‘‘अजून तुला गाडीची प्रॅक्टिस नाहीए. काही दिवस माझ्याबरोबर ड्रायव्हिंगला चल,’’ विनयनं म्हटलं.

‘‘आता गाडी घेतली आहे. तर प्रॅक्टिसही होईलच ना? माझं ड्रायव्हिंग लायसेन्सही तयार झालंय. आता तुम्ही दोघं थोडं रिलॅक्स राहायला शिका ना?’’

आता तर स्नेहाच्या वागण्याला काही ताळतंत्रच राहिलं नव्हतं. केव्हाही खायची, केव्हाही जायची. गाडी फारच जोराच चालवायची. सवितानं एकदा म्हटलं, ‘‘गाडी इतकी वेगात चालवू नकोस. मुंबईचं ट्रॅफिक अन् तुझा स्पीड…भीती वाटते गं…’’

‘‘मॉम, आय लव्ह स्पीड, आय एम यंग, वेगाने पुढे निघून जायला मला फार आवडतं.’’

‘‘तू पार्टीत डिंक्कस घेतेस, दारू पिऊन गाडी ड्राइव्ह करणं किती धोक्याचं आहे, कळतंय का तुला? भलतंच काही घडलं तर?’’

‘‘ममा, मी थकलेय तुझा उपदेश ऐकून ऐकून, काही घडेल तेव्हा बघू ना?

आत्तापासून काळजी कशाला?’’ रागानं पाय आदळत स्नेहा गाडीची किल्ली घेऊन निघून गेली.

सविता डोकं धरून बसून होती. या मुलीला कधी समज येणार? सविता अन् विनयला सतत टेन्शन असे.

एका रात्री स्नेहानं पार्टीत भरपूर दारू ढोसली. आपल्या नव्या ब्रॉयफ्रेंडसोबत, विकीसोबत खूप डान्स केला. मग ती विकीला त्याच्या घरी सोडायला निघाली. गाडीपर्यंत येतानाही तिचा तोल जात होता. कशीबशी ती ड्रायव्हिंह सीटवर बसली. विकीनं विचारलंदेखील, ‘‘तू कार चालवू शकशील ना? की मी चालवू.’’

‘‘डोंट वरी, मला सवय आहे.’’ स्नेहानं गाडी सुरू केली. नेहमीप्रमाणे खूप वेगात. तिला भीतिही वाटत नव्हती की कोणाची काळजीही नव्हती.

अचानक तिचा गाडीवरचा ताबा सुटला अन् गाडी उलट दिशेला वळली. समोरून येणाऱ्या गाडीला तिने जोरदार धडक दिली गेली. दोन्ही गाड्यांमधून किंकाळ्या उठल्या…दोन्ही गाड्या थांबल्या…दुसऱ्या कारमध्ये एक पुरुष ड्रायव्हर सीटवर होता. शेजारी बायको, मागच्या सीटवर मुलगा. स्नेहालाही खूप लागलं होतं. विकी खूप घाबरला होता. कसाबसा गाडीतून उतरला. स्नेहाला बाहेर यायला मदत केली. समोरच्या गाडीपाशी ती दोघं पोहोचली. आतलं दृश्य बघून स्नेहानं हंबरडाच फोडला. तिघंही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले…बहुधा मृत झालेले.

‘‘स्नेहा…सगळंच संपलंय…आता पोलीस केस होईल…’’ विकीनं म्हटलं.

स्नेहाची दारूची धुंदी खाडकन् उतरली. ती रडायला लागली. ‘‘विकी, आता काय करायचं रे? प्लीज हेल्प मी…’’

‘‘सॉरी स्नेहा, मी काहीच करू शकत नाही. आता पोलीस केस होईल…प्लीज माझं नाव यात गोवू नकोस. माझे डॅडी मला घरातून हाकलून देतील. आय एम सॉरी, मी जातोय…’’

‘‘काय?’’ स्नेहाला धक्काच बसला, ‘‘अरे…इतक्या रात्री, अशा अडचणीच्या वेळी तू मला सोडून जातो आहेस.’’

विकीनं उत्तर दिलं नाही. तो उलट दिशेने पळत सुटला. दिसेनासा झाला. जखमी अवस्थेत, निर्मनुष्य रस्त्यावर मध्यरात्री स्नेहा एकटीच उभी होती. तिला त्यावेळी एकच नाव आठवलं…तिनं ताबडतोब राहुलला फोन केला. नेहमीप्रमाणे राहुल लगेच मदतीला आला. त्याला बघून स्नेहा जोरजोरात रडायला लागली. ती खूप घाबरली होती. भीतिनं थरथर कापत होती. तिचं रडणं थांबेना.

राहुलनं तिला जवळ घेतलं. मायेनं थोपटत शांत केलं. ‘‘घाबरू नकोस स्नेहा, मी आहे ना? मी करतो काहीतरी. तुला खूप लागलंय. तुला डॉक्टरकडे नेतो. त्या आधी दोन जरूरी फोन करतो,’’ त्यानं त्याचा पोलिस इन्स्पेक्टर मित्र राजीव अन् डॉक्टर मित्र अनिलला फोन केला.

अनिल अन् राजीव आले. डॉक्टर अनिलनं त्या तिघांना बघितलं. तिघंही मरण पावले होते. स्नेहाला तर जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. आधी तिला हॉस्पिटलला नेलं.

सरिता अणि विनयही तिथं पोहोचले. स्नेहाला तर आईवडिलांकडे बघायचं धाडस होत नव्हतं. कित्येक दिवस पोलीस, कोर्टकचेरी, वकीलांचे प्रश्न, उलटतपासणी यात गेले. शारीरिक जखमा अन् मनावरचा ताण यामुळे स्नेहा पार थकली होती. तिची तब्येत खालावली होती. एका क्षणात आयुष्य एन्जॉय करण्याची, आधुनिक लाइफ स्टाइलची कल्पना पार बदलली होती. ती कायम कुठंतरी नजर लावून हरवल्यासारखी बसून असे. तिच्या मूर्खपणाने तीन जीव हकनाक बळी गेले होते. ती स्वत:ला क्षमा करू शकत नव्हती. स्वत:च्या वागणुकीची तिला खूप लाज वाटत होती. वारंवार ती राहुलची अन् स्वत:च्या आईवडिलांची क्षमा मागत होती. सविता आणि राहुलनंच तिचा खटला चालवला. त्यासाठी दिवसरात्र श्रम केले. खूपच मोठ्या रकमेच्या जामिनावर तिला काही दिवस सोडण्यात आलं. किती तरी दिवसांनी तिनं मोकळा श्वास घेतला. तिची तब्येत अजूनही सुधारत नव्हती. तिची नोकरी सुटली होती. पार्टीतले मित्र मैत्रिणी कुठं नाहीसेच झाले होते. हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या ती आपल्या आयुष्याचा विचार करायची. रात्री बेरात्री दचकून उठायची. कार एक्सिडेंट अन् तीन मृत्यू सतत डोळ्यांपुढे दिसायचे. कोर्टकचेरीच्या जंजाळातून सविता अन् राहुलनं तिला सोडवलं होतं. पण स्वत:च्या मनाच्या न्यायालयात ती स्वत:च दोषी ठरत होती.

आईवडिल, राहुल व त्याचे आईवडिल सतत तिच्यासोबत होते. तिला समजावत होते. धीर देत होते. तिला शारीरिक व मानसिक विश्रांती कशी मिळेल हे बघत  होते. त्यांच्या प्रेमळ सान्निध्यात ती हळूहळू सावरत होती. आता तिला आईवडिलांच्या प्रेमाचा, काळजीचा अर्थ समजला होता. माणुसकी, मैत्री, जबाबदारीचा अर्थ कळला होता. आधुनिकता अन् वागणूक, राहणीमान विचारसरणी सगळ्याच गोष्टी आता तिला पूर्णपणे लक्षात आल्या होत्या.

एक दिवस हॉस्पिटलमध्ये विनय, सविता, अभय आणि नीता तिच्याभोवती होते तेव्हा तिनं आईकडून मोबाइल मागून घेतला अन् राहुलला फोन करून तिथं बोलावून घेतलं.

नेहमीप्रमाणेच काही वेळात राहुल तिथं येऊन पोहोचला. स्नेहाच्या बेडवर बसत त्यानं विचारलं, ‘‘का मला बोलावलंस?’’

बेडवर उठून बसत स्नेहानं त्याचा हात हातात घेतला. ‘‘यावेळी कामासाठी किंवा मदतीसाठी नाही बोलावलं मी.’’ स्नेहानं म्हटलं, ‘‘सगळ्यांच्या समोर कबूल करायचं आहे, आय एम सॉरी, फॉर एव्हरी थिंग. तुम्हा सगळ्यांची मी क्षमा मागते. तुम्ही सगळीच माणसं खूप खूप चांगली आहात…राहुल, तू खूप चांगला आहेस, पण मी फार वाईट आहे रे…’’ बोलता बोलता स्नेहा रडायला लागली अन् तिनं राहुलला मिठी मारली. प्रथम तर राहुल थोडा गडबडला. पण मग त्यानंही तिला मिठीत घेत थोपटून शांत करायला सुरूवात केली. उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर अपूर्व समाधान, संतोष होता. डोळे मात्र पाणावले होते. मनातली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळाले होते.

दिसतं तसं नसतं

कथा * मीना साळवे

‘‘लग्नाच्या वाढदिवसा प्रित्यर्थ मन:पूर्वक अभिनंदन, तूलिका ताई,’’ माझ्या वहिनीनं फोन करून मला शुभेच्छा दिल्या.

‘‘लग्नाचा वाढदिवस आहे ना? खूप खूप?शुभेच्छा आणि आशिर्वाद,’’ आईनं म्हटलं.

बाबाही बोलले, ‘‘अगं, जावई कुठं आहेत? त्यांनाही माझे आशिर्वाद व शुभेच्छा.’’

‘‘सांगते बाबा, ते ऑफिसला गेले आहेत.’’

‘‘काही हरकत नाही. मी नंतर बोलेन त्यांच्याशी.’’

त्यांचा फोन ठेवतेय तोवर धाकटी बहीण कांचनाचा अन् तिच्या नवऱ्याचाही फोन येऊन गेला.

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण माझ्या नवऱ्यानं मात्र काहीच उत्साह दाखवला नव्हता. ऑफिसला निघण्यापूर्वी तो माझ्याशी धड बोललाही नव्हता. मला मान्य आहे की सध्या त्याला ऑफिसात फार काम पडतंय, कामाचा ताण खूप आहे पण म्हणून काय झालं? लग्नाचा वाढदिवस रोज रोज थोडाच येतो?

जाता जाता रवीनं एवढं म्हटलं होतं, ‘‘तूलिका, आज मी लवकर घरी येतो. आपण आज बाहेर जेवायला जाऊयात.’’

सकाळची दुपार झाली. दुपारची सायंकाळ अन् आता रात्र झालीय. अजून रवी घरी परतले नाहीत. कदाचित माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येत असतील अशी मी माझीच समजूत काढत होते.

‘‘आई, भूक लागलीय,’’ माझ्या पाच वर्षांच्या मुलीनं मला भंडावून सोडलं.

तिच्यासाठी तिच्या आवडीचं खायला करून दिलं, तेवढ्यात दाराची घंटी वाजली.

रवी आले होते. ‘‘तूलिका, क्षमा कर गडे, अगं, बॉसनं अचानक मीटिंग बोलावली. माझा नाइलाज झाला. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,’’ माझ्या हातात फुलांचा गुच्छ देत त्यांनी म्हटलं. ‘‘फुलांसारख्या टवटवीत माझ्या पत्नीसाठी ही प्रेमाची भेट. सात वर्षं झालीत ना आपल्या लग्नाला? खरं तर खूप इच्छा होती आज छान सेलिब्रेट करण्याची.’’

मी त्यांच्या बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फुलांचा गुच्छही एका बाजूला ठेवला. रवी म्हणाले, ‘‘अगं, आज हॉटेलातही खूप गर्दी होती. तरीही मी तुझ्या आवडीचे जेवणाचे सर्व पदार्थ पॅक करून आणले आहेत. जेवण एकदम गरम आहे. पटकन् वाढतेस का? जेवूया आपण. फार भूक लागलीय अन् दमलेही आहे मी.’’

‘‘एवढी भूक लागली आहे तर बाहेरच जेवायचं ना? घरी घेऊन कशाला आलात? अन् एवढा पैसा त्या बुकेवर खर्च करण्याची तरी काय गरज होती? तुम्ही जेवून घ्या. मला भूक नाहीए,’’ मी रागातच बोलले.

‘‘अगं, क्षमा मागतोय ना? बॉसनं मीटिंग ठरवल्यावर मला काहीच म्हणता आलं नाही. मलाही खूप वाईट वाटतंय, पण काय करू शकतो? माफ कर दो यार, दिल साफ करो, चल, जेवूयात. मी आलोच फ्रेश होऊन.’’

‘‘मला जेवायचं नाहीए. मी झोपायला जातेय.’’

‘‘उपाशी झोपू नकोस, तूलिका…’’ रवीनं पुन्हा विनवलं. पण मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून बेडवर येऊन झोपले.

रवीनं सगळी अन्नाची पार्सलं फ्रीजमध्ये ठेवली अन् तेही न जेवताच झोपले.

कुठल्या माणसासोबत मी लग्न करून बसले…लग्नाला इतकी वर्षं झालीत पण कधी कौतुक नाही, कसली हौसमौज नाही. आज निदान हॉटेलात जेवायला तर जाता आलंच असतं.

एक हा माझा नवरा आहे अन् दुसरा माझ्या धाकट्या बहिणीचा नवरा…किती प्रेम करतो तिच्यावर, किती किती, काय काय आणत असतो तिच्यासाठी. माझा राग कमी होत नव्हता. उपाशी पोटी झोपही येत नव्हती. पण मी ग्लासभर पाणी पिऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले. रवीला झोप लागली असावी. त्याला कधीच का समजत नाही. मला काय हवंय? मला काय आवडतं? धुमसत असतानाच कधी तरी मला झोप लागली.

‘‘गुडमॉर्निंग राणी सरकार,’’ सकाळी मला मिठीत घेत रवीनं म्हटलं. तो नेहमीच मला सकाळी गुडमॉर्निंग करायचा,पण आज मला त्याची मिठी अजिबात नकोशी झाली होती.

त्याला दूर ढकलत मी डाफरले, ‘‘हे प्रेमाचं नाटक बंद करा. जितके साधे सरळ दिसता, तसे तुम्ही नाही आहात…मला तुमचं खरं रूप कळतंय.’’

‘‘आता मी जसा आहे, तुझा आहे. काल खरंच तुझी खूप निराशा झाली. पण खरंच सांगतो गं, माझ्या बॉसचा मलाही राग आला होता…पण नोकरी तर करावीच लागेल ना? पगार मिळाला नाही तर संसार कसा करणार?’’

‘‘नोकरी, नोकरी, नोकरी!! अशी काय मोठी लाखभर रूपये देणारी नोकरी आहे तुमची? काय असं घेतलंय तुम्ही माझ्यासाठी नोकरीतून? रोज दोन्ही वेळ जेवायला मिळतंय. अंगभर कपडे आहेत अन् हे घर आहे. या व्यतिरिक्त काय दिलंय?’’

‘‘तूलिका, अगं याच तर मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा काही लोकांना हेसुद्धा मिळत नाही. आता सोड ना राग…तू रागावलीस ना की अगदीच छान दिसत नाहीत. तू आनंदात राहा, चल, आज आपण बाहेर जाऊ, मनसोक्त भटकू, जेवण करू, तुझी इच्छा असली तर सिनेमाही बघू. आजच्या सुट्टीचा उपयोग पुरेपूर करू. लग्नाचा बिलेटेड वाढदिवस साजरा करतोय. चल ना, अजून किती वेळा सॉरी म्हणू? प्लीज एकदा हस ना?’’

‘‘मला कुठंही जायचं नाहीए. अन् पुन्हा माझ्याशी बोलायचा प्रयत्नही करू नका. तुमच्याशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतोय मला. काय माझ्या बाबांनी बघितलं तुमच्यात अन् माझं लग्न करून दिलं तुमच्याशी. किती, किती दिलं होतं बाबांनी मला, सगळं तुमच्या आईवडिलांनी ठेवून घेतलं. केवढी स्वप्नं होती माझी. लग्नानंतर काय काय करेन म्हणून. पण तुम्हाला कसली हौसच नाही. आता मी काहीही मागणार नाही तुमच्याकडे, काय हवं ते माझ्या बाबांकडून मागून घेईन. तुमच्यासारख्यांनी खरं तर लग्नच करू नये…उगीच एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं…’’ मी अगदी ताबा सोडूनच बोलत होते.

‘‘मी तुझ्या बाबांना आधीच सांगितलं होतं, मला काहीही नको म्हणून. माझीही काही तत्त्वं आहेत, जीवनमुल्य आहेत. माझ्या प्रामाणिकपणाच्या कमाईवरच मला संसार करायचा आहे. तुलाही सुखी ठेवायचं आहे. मी माझ्या वडिलांकडून पैसे घेतले नाहीत, तुझ्याही बाबांकडून घेतले नाहीत. तुझ्या बाबांनी दिले अन् माझ्या बाबांनी घेतले, त्याला मी काय करू? सध्या घराच्या लोनचे हप्ते फेडतोय. एका वर्षांत तेही फिटतील. मग तुझ्या हातात भरपूर पैसा असेल…आपण तेव्हा खूप काही करणार आहोत. तूलिका, मला खात्री आहे स्वत:बद्दल, तूही माझ्यावर विश्वास ठेव. माझं प्रेम आहे तुझ्यावर, तुला सुखात ठेवायचं वचन दिलंय मी स्वत:लाच.’’

रवी परोपरीनं मला समजवत होते, पण माझं डोकंच फिरलं होतं. माझा राग संपतच नव्हता. सगळा सुट्टीचा दिवस तसाच गेला. सायंकाळी लेक मागे लागली बाहेर जाऊयात. रवी तिला घेऊन बाहेर गेले. मलाही आग्रह केला पण मी हटूनच बसले. नाहीच गेले.

त्याच वेळी वहिनीचा फोन आला, ‘‘तूलिका कशी आहेस? तुम्हा दोघांना डिस्टर्ब नाही ना केलं?’’

‘‘नाही वहिनी. बोल, काय म्हणतेस?’’

‘‘अगं, आजच कांचना आलीय नवऱ्यासोबत, तर आईबाबांची इच्छा होती की तुम्हीही चार दिवस यावं, सगळे एकत्र जमूयात.’’

‘‘वहिनी, रवींना विचारून तुला सांगते. मला आवडेल सगळ्यांना भेटायला.’’ मी फोन ठेवला. मनात आलं कांचना किती भाग्यवान आहे? आत्ताच नवऱ्यासोबत सिंगापूरला फिरून आलीय. लगेच माहेरीही आली.

मी ठरवलं, काही दिवस माहेरी जातेच. थोडी लांब राहीन घरापासून तर माझं बिथरलेलं डोकंही शांत होईल. मला रवीला धडाही शिकवायचाच होता. तो तर मला पूर्णपणे गृहीतच धरतो.

‘‘आई…’’ लेकीनं येऊन मला मिठी मारली. कुठंकुठं फिरली, काय काय बघितलं, काय काय खाल्लं, सगळं सगळं सांगत होती. खूप आनंदात होती. ‘‘आई, बाबांनी तुझ्यासाठीही आईस्क्रीम आणलंय,’’ निमा म्हणाली.

‘‘मला नाही खायचं. बाबांना म्हणा. तुम्हीच खा. अन् बाबांना म्हणा, आम्हाला आजोबांकडे जायचंय, आमचं तिकिट काढून द्या.’’

‘‘बाबा, आम्ही आजोबांकडे जाणार आहोत. आमचं तिकिट घेऊन या.’’

‘‘निमू, तुझी आई माझ्यावर रागावली आहे म्हणून ती मला सोडून जाते आहे…ठिक आहे, मी तिकिट काढून आणतो,’’ निमाला जवळ घेत, माझ्याकडे बघून रवीनं म्हटलं.

रवी जेव्हा मला व निमाला गाडीत बसवून देण्यासाठी आले, तेव्हा ते फार उदास होते. गाडी हलली, रवी हात हलवून आम्हाला निरोप देत होते.. निमा बाबा, बाबा ओरडत होती. रवी सतत माझ्याकडे बघत होता. मला त्या क्षणी वाटलं, मी माहेरी जाते आहे ही चूक आहे का? क्षणभर वाटलं, गाडीतून उतरावं, पण एव्हाना गाडीनं स्पीड घेतला होता. प्लॅटफॉर्मही संपला होता, मला आता वाटत होतं, मी रवीशी फार वाईट वागले…सकाळी आम्ही माझ्या माहेरी पोहोचलो.

सगळे भेटले…छान वाटलं मला. आईबाबांना तर खूपच आनंद झाला. रवीबद्दल सर्वांनी विचारलं, मी म्हटलं, ‘‘सध्या त्यांना रजा मिळाली नाही, पुढे येतील.’’

इथं येऊन चार पाच दिवस झाले होते. रवी रोज सकाळ संध्याकाळ फोन करत होते. कांचना अन् परेशचं प्रेम जणूं उतू जात होतं. ते बघून माझा जळफळाट होत होता. आत्ताच बाबांनी त्यांना सिंगापूर ट्रिप गिफ्ट केली होती. रवीलाही विचारलं होतं. त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. माझी तेव्हा चिडचिड झाली होतीच. आईबाबांच्या खोलीवरून जाताना माझ्या कानावर शब्द पडले, ‘‘थोरले जावई खूपच समजूतदार व स्वाभिमानी आहेत. कांचनाला लग्नातच तूलिकापेक्षा किती तरी जास्त दिलं होतं. आत्ताच सिंगापूर ट्रिप झाली. जावई आता युरोप टूर मागताहेत,’’ बहुतेक बाबा आई किंवा दादाजवळ बोलत असावेत.

त्या दिवशी आईबाबा आणि दादा वहिनींना रात्री कुठंतरी लग्नाला जायचं होतं. मी आणि निमा हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो होतो. ‘‘मोठ्या ताई, स्वयंपाक करून ठेवलाय. तुमच्या सोयीनं तुम्ही जेवणं आटोपून घ्या.’’ असं सांगून स्वयंपाकीण निघून गेली.

आठ वाजता निमाला भूक लागली. अन्न गरम करायचं का की गरम आहे हे बघायला मी स्वयंपाकघरात जात होते. तेवढ्यात कांचनाच्या खोलीतून हसण्याबोलण्याचा अन् इतरही काही विचित्र आवाज कानावर आला. मी चिडचिडून स्वत:शीच बोलले, ‘‘या कांचनाचा अन् परेशचा पोरकटपणा, थिल्लरपणा संपत नाहीए. निदान अशावेळी खोलीचं दार तरी बंद करून घ्यावं.’’

मी स्वयंपाकघरातून निमाचं ताट तयार करून आणतेय तोवर मला कांचना फाटकातून येताना दिसली.

‘‘काचंना बाहेरून येतेय, मग तिच्या खोलीत कोण होतं?’’ मी चक्रावले. मला विचित्र शंका आली. मी पटकन् पुढे होऊन तिला विचारलं, ‘‘बाहेर गेली होतीस?’’

‘‘हो ना ताई, शेजारच्या स्वाती वहिनी कधीपासून बोलवत होत्या. त्यांना भेटायला गेले तर त्यांनी मला इतका वेळ थांबवून घेतलं,’’ ती म्हणाली.

‘‘कांचना, हे निमाचं ताट घेऊन माझ्या खोलीत जा. मी तिला घेऊन येतेच.’’ मी तिला व निमाला खोलीत ढकललीच. मागे वळून बघते तर शेजारी स्वाती वहिनीकडे कपडे धुणारी कम्मो ब्लाउजची बटणं लावत हसत हसत कांचनाच्या खोलीतून बाहेर पडताना दिसली. साडी, केस अस्ताव्यस्त होते. माझ्याकडे लक्ष जाताच ती चपापली अन् घाबरून पटकन् मागच्या दारानं निघून गेली.

माझे हातपाय गार पडले. परेश एका मोलकरणीशी असे संबंध ठेवतो? किती हलकट आहे हा माणूस? अन् माझ्या वडिलांच्या पैशावर पण त्याचा डोळा आहे? माझ्या बहिणीशी प्रेमाचं नाटक करतोय? मी कशीबशी खोलीत पोहोचले.

खोलीत निमा मावशीकडून गोष्ट ऐकत जेवत होती. ‘‘ताई, हिचं जेवण आटोपलंय.’’ कांचना म्हणाली.

‘‘तू जा आता. मी तिला झोपवते,’’ मी कांचनाला निरोप देत म्हणाले.

देवा रे! अजून माझं डोकं भणभणंत होतं. मी परेशला पैसेवाला, कौतुक करणारा नवरा समजत होते. बिचारी कांचना तिचाही विश्वासघात करतोय हा नालायक परेश…

रवी तर माझ्या सुखात आपलं सुख बघतो. मी किती वाईट वाईट बोलले त्याला…त्यानं कधी माझ्या बाबांकडून एका पै ची अपेक्षा ठेवली नाही. कधी तो दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघत नाही. माझ्यासाठी निमासाठीच इतके कष्ट करतोय. माझे डोळे भरून आले. रवीची खूपच आठवण यायला लागली.

सकाळी नेहमीप्रमाणे रवीचा फोन यायला हवा होता पण आला नाही. मीच फोन लावला तर उचलला गेला नाही. मी पुन्हापुन्हा फोन लावत होते. उचलला जात नव्हता. मी बेचैन झाले, काळजी दाटून आली. शेवटी ऑफिसात फोन केला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, ‘‘आज रवी सर ऑफिसला आलेच नाहीत. कालही सायंकाळी लवकर घरी गेले. त्यांना बरं नाहीए असं वाटत होतं.’’

माझी काळजी खूपच वाढली. मी आईबाबांना म्हणाले, ‘‘रवींना बरं नाहीए. त्यांच्या ऑफिसमधून कळलं. मला लवकर घरी गेलं पाहिजे.’’

‘‘काळजी करू नकोस. तुला विमानाचं तिकिट काढून देऊ का?’’ बाबांनी विचारलं.

‘‘नको, मी रेल्वेनंच जाईन,’’ मीही म्हणाले. कारण रवीला मी वडिलांचा पैसा वापरलेला आवडत नसे.

प्रवासभर माझं मन थाऱ्यावर नव्हतं, रवी कसा असेल. त्याला काय झालं असेल, सतत काळजी जीव पोखरत होती. सकाळी सात वाजता आम्ही घरी पोहोचलो. बेल वाजवली. दार उघडलं नाही. मी माझ्याजवळच्या किल्लीनं लॅच उघडलं. आम्ही दोघी आत गेलो तर सोफ्यावर रवी झोपलेले. अंगाला हात लावला तर लक्षात आलं ते तापानं फणफणले आहेत. मी ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. त्यांनी येऊन तपासलं. इंजेक्शन दिलं.

आम्हाला घरात बघून ते चकित झाले, ‘‘अरे? तुम्ही दोघी परत कधी आलात? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तब्येत बरी नसल्याचं कळवलं नाही तुम्हाला,’’ रवीचे डोळे भरून आले. माझे हात हातात घेऊन ते म्हणाले, ‘‘सॉरी तूलिका, तुला उगीचच माहेरहून लवकर परत यावं लागलं.’’

‘‘सॉरी मी म्हणायला हवंय. किती वाईट वागले मी तुमच्याशी.’’ माझे डोळे जणू अश्रू गाळत होते. रवी सतत माझा विचार करायचे. मीच करंटी..त्यांचा विचार कधी केलाच नाही मी.

निमाला काय घडतंय ते धड समजत नव्हतं. मी रवीला मिठीच मारली. ‘‘सॉरी रवी.’’ मी म्हटलं, त्यांनीही मला घट्ट मिठीत घेतलं. ‘‘तूलिका, मनातलं सगळं किल्मिष काढून टाक, आपण दोघं एकमेकांचे आहोत आणि एकमेकांसाठीच आहोत. आपण कधीच एकमेकांना अंतर देणार नाही,’’ रवीनं म्हटलं.

निमानंही आम्हाला मिठी मारली. खरंच आम्ही एकमेकांचे अन् एकमेकांसाठीच होतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें