मुलांना जंक फूडपासून वाचवा घरच्या घरी हे बनवा

* नीरा कुमार

बर्गर, पिझा, हॉट-डॉग, नूडल्स, पास्ता, चिप्ससारखे खाद्यपदार्थ मुलांना खूपच आवडतात. मात्र याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही, उलट जंक फूडमध्ये फॅटचं प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढतं, या पदार्थांच्या अत्याधिक सेवनामुळे मुलं लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदय व यकृताशी संबंधित आजारांना बळी पडतात.

चला तर मग जाणून घेऊया की कशाप्रकारे प्रत्येक आई आपल्या मुलांना घरातच त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला घालू शकते.

* मुलांना चाउमिन, पास्ता, नूडल्स वगैरे खूपच आवडतात. त्यासाठी आटा नूडल्स वा मल्टीग्रेन इत्यादी विकत घ्या. यामध्ये रंगीबेरंगी भरपूर भाज्या उदाहरणार्थ ब्रोकली, गाजर, मटार, हिरवी, लाल, पिवळी सिमला मिरची, टोमॅटो इत्यादी हॅण्ड चॉपरने बारीक कापून टाका. कारण मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्या त्यांना कळूनदेखील येणार नाहीत. नूडल्स, पास्ताचं प्रमाण कमी ठेवा आणि भाज्यांचं अधिक. पास्तामध्ये टोमॅटोसोबत काही भाज्यांची पेस्ट करून घ्या, नंतर शिजवा. बघा मुलं आवडीने खातील.

* २-३ फळं एकत्रित करून त्यांचा रस काढून मुलांना प्यायला द्या. मुलं अनेकदा पालक खायला कंटाळतात. जर पालकाच्या प्यूरीत जलजीरा पावडर, मीठ, जिरे व लिंबाचा रस टाकून कुलकुल ड्रिंक मुलांना दिलं तर ते मजेत पितील. आंबा, केळं, चीकू मुलांची आवडती फळं आहेत. ती दुधासोबत एकत्रित करून शेक बनवून मुलांना द्यावीत.

* उन्हाळ्यात मुलांना आइस्क्रीम, कुल्फी खायला खूप आवडतात. त्यासाठी भरपूर फळं सुरीने बारीक कापून घ्या. दुधामध्ये केळं वा आंबा टाकून शेक बनवा. त्यामध्ये सर्व फळं व सुका मेवा टाकून आइस्क्रीम वा कुल्फी बनवा आणि मुलांना द्या.

* सॅण्डविचेसदेखील मुलांना खूप आवडतात. खासकरून बटाटा आणि पनीरची. यामध्ये तिन्ही प्रकारच्या सिमला मिरची बारीक कापून एकत्रित करा व परतून घ्या. यामुळे पौष्टिकता वाढेल.

* मुलांना जी पोळी खायला देता त्या कणकेमध्ये भाज्यांची प्युरी एकत्रित करा. इतर पीठं उदाहरणार्थ, मूगडाळीचं पीठ, जवाचं पीठ, नाचणीचं पीठ इत्यादी एकत्रित करा. यापासून बनविलेल्या पोळ्या खूपच रुचकर व पौष्टिक होतील आणि मुलंदेखील आवडीने खातील.

* मुलांना पॉपकॉर्न खूप आवडतात. त्यासाठी घरच्या घरी सॉल्टेड पॉपकॉर्न बनवा.

* फ्रोजन भाज्या व कॉर्नचा वापर करून कटलेट, बर्गर बनवा. मात्र हे डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय करा. बर्गरमध्ये टोमॅटो, कांदा पनीर, सलाडची पानं लावा. त्यामुळे हे सर्व पाहायला आकर्षक दिसेल व खाण्यास पौष्टिक लागेल.

* गव्हाच्या कणकेचा पिझाचा बेस बाजारात उपलब्ध असतो. त्याचा वापर करा परंतु घरच्या घरीच बनवा.

* ब्राउन राइस उकळून चटपटीत भेळ चाट बनवा. मुलांना नक्कीच ते खूप आवडेल.

* उन्हाळ्यात मुलांना बर्फाचा गोळा खूपच आवडतो, कलिंगड, स्ट्रॉबेरीक्रश, टरबूज व खस सरबताचे गोळे बनवा. त्यामध्ये स्टीक लावा. गोळा झाल्यावर मुलांना चोखताना खूपच मजा येईल.

* फळं कापून कस्टर्डमध्ये एकत्रित करून मुलांना द्या.

* हिरव्या पानांच्या भाज्यांची प्यूरी बनवा आणि ती कणकेत एकत्रित करून हिरवी, लाल, पिवळी पोळी वा पराठे बनवा.

* मुलांना चिप्सदेखील खूप आवडतात. बटाट्याचे चिप्स शॅलो फ्राय करा. खूपच कमी फॅटमध्ये चिप्स तयार होतील. एक लहान चमच्याच्या तेलात १०० ग्रॅम शेंगदाणे सहजपणे तळता येतील.

* मुलांना ओट्सचा पराठा द्या. मुलांना ओट्स फारसे आवडत नसल्यामुळे ओट्सची पावडर बनवा आणि कणकेसोबत मळून त्याचे पराठे बनवा. पराठे रुचकर व पौष्टिक बनतील.

मेड नव्हे तर लाईफलाईन म्हणा

* रोचिका शर्मा

जिममध्ये संध्याबरोबर ट्रेडमिलवर चालत असताना मी शॉपिंगची योजना बनविली. घरी जाऊन आंघोळ करून न्याहारी केली आणि त्यानंतर संध्याचा फोन आला. म्हणू लागली की एक तास उशीराने निघूया. आज कामवाली बाई आलेली नाही. मी जरा स्वयंपाकघर आणि घर स्वच्छ करून घेते किंवा मग उद्या जाऊया. हे सांगत असताना ती खूप दु:खी होती आणि म्हणत होती की जेव्हा मेड रजा घेते तेव्हा ती अगोदर सांगतही नाही.

मीसुद्धा काय करणार होते, एक तास उशीरा चालण्याचे मान्य केले. कारण दुसऱ्या दिवशी माझी डॉक्टरांशी अपॉइंटमेंट होती. पण आता आमच्याकडे खरेदीसाठी कमी वेळ होता कारण मुले शाळेतून येण्यापूर्वी आम्हाला घरी परत यायचे होते.

अनेक समस्या

दुसऱ्या दिवशी माझी कामवाली बाई उशीराने आली, पण मला डॉक्टरकडे जावे लागणार होते, मग मी बेडरूमला कुलूप लावले आणि घराची चावी शेजारच्या घरात देऊन निघाली जेणेकरून कामवाली बाई आल्यावर ती स्वयंपाकघर आणि बाकीचे घर स्वच्छ करेल. मला तिला घरात एकटं सोडण योग्य वाटत नव्हतं पण विवश होते कारण आम्ही विभक्त कुटुंबात राहतो.

ही समस्या आज जवळजवळ प्रत्येक घरात आहे. नोकरी व बदल्यांमुळे संयुक्त कुटुंबे कोसळत आहेत, तर कार्यरत महिलांची संख्या वाढत आहे. मुले, म्हातारे आणि तरूण सगळे घरातील नोकरांवर अवलंबून आहेत.

साफसफाईपासून ते स्वयंपाक बनवण्यापर्यंत, मुलाचे संगोपन करण्यापासून वृद्धांची काळजी घेण्यापर्यंत सर्व कामे कामवाल्या बाया घरा-घरांत करत आहेत.

मेड आणि मॅडम एकमेकांना पूरक आहेत

मुंबईत राहणारी रिया सांगते, ‘‘मी जेव्हा गर्भवती होते. तेव्हा माझ्या घरात काम करणाऱ्या मुलीने माझी खूप काळजी घेतली. मी तिला न दिलेली कामेदेखील ती करायची आणि एवढेच नाही तर माझ्या मुलीच्या जन्मानंतर जेव्हा मी कामामध्ये व्यस्त होते तेव्हा ती तिच्याबरोबर खेळत असे आणि जेव्हा-जेव्हा मी कामासाठी बाहेर जात असे तेव्हा ती माझ्याबरोबर जात असे. जेणेकरून ती माझ्या मुलीची काळजी घेऊ शकेल.

तिची वागणूक पाहून आम्ही तिला घरातील सदस्याचा दर्जा दिला. आमच्या घरी नातेवाईकदेखील आले तरी तिला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आदर द्यायचे.

‘‘मी स्वत: ही तिच्या कुटुंबाच्या गरजा भागवत असे. आम्ही दोघी एकमेकांच्या पूरक झाल्या. काही वर्षांनी तिचे लग्न झाले तेव्हा आम्ही तिची मुलीप्रमाणे पाठवणी केली आणि तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदतदेखील केली.’’

परिस्थितीने विवश केले

हैदराबादची रहिवासी असलेली कोमल म्हणते, ‘‘मी माझ्या कामवालीला घराच्या सदस्याप्रमाणे ठेवले होते. परंतु दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर जेव्हा तिला रात्रंदिवस घरीच राहण्याचे काम देण्यात आले. तेव्हा तिने घरात चोरी सुरू केली. स्वयंपाकघरातील खाण्याच्या वस्तूंपासून सुरुवात केली. आणि हळू- हळू तिचे धाडस वाढू लागले.

‘‘एक दिवस तिने संधी बघून माझ्या कपाटातून सोन्याच्या बांगडया चोरल्या. मी पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हापासून माझ्या घरात कुठलीही कामवाली बाई काम करण्यास तयार नाही.’’

बदलीमुळे चेन्नईला गेलेल्या मोहिनी म्हणतात, ‘‘भाषा ही पहिली समस्या आहे. येथे हिंदीभाषी कामवाल्या फारच कमी आहेत, म्हणून त्यांची मागणी आहे. म्हणून, मी थोडी तमिळ शिकले आहे.

‘‘परदेशात हातांनी काम करून येणाऱ्यांसाठी कामवाल्या बाया या लक्झरीसमान आहेत. म्हणूनच ते त्यांना केवळ मागतील ती किंमतच देत नाहीत तर त्यांचे खूप नखरेदेखील पुरे करतात. त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचा त्या खूप फायदाही घेत आहेत. वेळेवर कामावर न जाणे जणू ही त्यांची सवयच झाली आहे.’’

मेड शिक्षित असावी

आजकाल ही समस्या सामान्य स्त्रियांना आहे. प्रत्येकीला घरी एक चांगली, स्वच्छ, प्रामाणिक आणि वेळेवर येणारी कामवाली हवी आहे. परंतु एकाच स्त्रीमध्ये हे सर्व गुण असणे फार कठीण आहे.

आजच्या घडीला त्या प्रत्येक घराची जीवनरेखा आहे, म्हणून अशा परिस्थितीत हा प्रयत्न केला गेला पाहिजे की भले जास्त पगार द्यावा लागेल, परंतु थोडी सुशिक्षित आणि चांगल्या दर्जाची मेड्स ठेवली जावी.

कीर्तन धार्मिक किट्टी पार्टी

* प्राची भारद्वाज

‘‘शैलजा, उद्या तू कामाला जाऊ नकोस. सुट्टी घे. नवदुर्गाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात कीर्तन असते. माताराणीच्या चरणी आपण दोघी लीन होऊया,’’ असे सासूनं सांगितल्यावर शैलजाला होकारार्थी मान डोलवावी लागली.

शैलजा नवविवाहिता होती. सासरचे वातावरण खूपच धार्मिक असल्याचे तिला लग्नावेळी केलेल्या पूजाविधीतूनच लक्षात आले होते. प्रत्येक मुलीला सासरच्यांशी जुळवून घ्यावे लागते, असा विचार करून शैलजाही तिचा सासरचे प्रत्येक रीतीरिवाज, सण-उत्सव साजरे करू लागली होती.

महानगरात लहानाची मोठी झालेली, आजच्या आधुनिक काळातील मुलगी असूनही, एक चांगली सून होण्यासाठी तिने आपल्या आधुनिक विचारसरणीला मुरड घातली होती.

नि:श्वासे न हि विश्वास: कदा रुद्धो भविष्यति।

कीर्तनीयमतो बाल्याद्धरेनार्मैव केवलम्॥

कैवल्याष्टकम – ४ शास्त्रानुसार श्वासाचे काही खरे नसते. म्हणूनच लहानपणापासूनच भजन कीर्तनात रमायला हवे. या विचारांचा फायदा लांडग्याची कातडी ओढून घेतलेले आजचे ढोंगी भ्रष्ट गुरू घेतात. आता विचार करायची गोष्ट अशी की, जर लहानपणापासूनच भजन कीर्तनात वेळ घालवू लागलो आणि इष्टदेवता किंवा गुरूचा जप सुरू करू लागलो तर मग अभ्यासाला कितीसा वेळ मिळेल, शिवाय करिअरचे नुकसान होईल ते वेगळेच. त्यावर जर आसाराम किंवा राम रहिमसारखा गुरू मिळाला तर काय परिणाम होईल, हे सर्वश्रृत आहे.

कीर्तनाआडून एकच मानसिकता विकली जाते ती म्हणजे पुण्य कमवायचे असेल तर कीर्तन, सत्संग करावा लागेल. जो देवाचे नाव घेणार नाही किंवा इतरांना असे करण्यापासून परावृत्त करेल तो पापाचा भागीदार होईल.

कीर्तन विरुद्ध अवडंबर

कीर्तन ही केवळ देवाच्या नामस्मरणात तल्लीन होण्याची प्रक्रिया नाही तर समाजात आपली श्रीमंती दाखवून देण्याचा योग्य मार्ग बनत चालला आहे. पूजेच्या दरबाराला भारदस्त ओढण्या, लाईटच्या माळा आणि फुलांची सजावट, येणाऱ्या सर्व महिलांची बसण्याची व्यवस्था करणे, धूप, अगरबत्ती, कापूरचे ताट सजवणे, येणाऱ्या लोकांसाठी मृदंग, टाळ यांची व्यवस्था करणे, प्रसादात उपवासाच्या पदार्थांची सोय करणे, हे सर्व हेच दर्शवते.

इतकेच नाही तर कीर्तनानंतर चहा-नाश्त्याची व्यवस्थाही करायची असते. कीर्तन आयोजित करणारी महिला किती हुशार आहे, हे तिच्या कीर्तन मॅनेजमेंटवरुन ठरत असते.

मोक्षाची नाही प्रशंसेचा हव्यास

एका पौराणिक कथेनुसार एकदा नारद मुनींनी ब्रह्माजींना सांगितले, ‘‘असा एखादा उपाय सांगा ज्यामुळे अक्राळविक्राळ काळाच्या जाळयात मी अडकणार नाही.’’

याच्या उत्तरादाखल ब्रह्माजींनी सांगितले:

आदिपुरुषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूत कलिर्भवति.

अर्थात, जर एखाद्याने देवाचे नाव घेतले फक्त तरच तो या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होईल. असाच एक श्लोक पद्म पुराणात आहे :

ये वदंति नरा नित्यं हरिरित्यक्षरद्वयम्।

तस्योच्चारणमात्रेण विमुक्तास्ते न संशय:॥

यात इथपर्यंत सांगण्यात आले आहे की, शुद्ध (पवित्र) किंवा अपवित्र (अशुद्ध), सावध किंवा बेसावध अशा कोणत्याही क्षणी ‘हरि’ नामाचा जप केल्यास किंवा नामोच्चार केल्यास मनुष्याला मुक्ती मिळते. यात कोणतीही शंका नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, ‘मुक्ती’ म्हणजे काय? धर्मानुसार मुक्ती म्हणजे संसार, प्रपंचापासून मुक्त होणे. पुढचा, मागचा जन्म काय आहे, हे कोणी सप्रमाण सांगू शकेल का? कीर्तन केल्यामुळे जन्म-मृत्यूपासून मुक्ती मिळाली, हे देखील कुणीही सिद्ध करू शकत नाही. तर मग मोक्ष म्हणजे काय?

ज्या महिला कीर्तनात टाळमृदंग वाजवतात त्यांना मोक्षाऐवजी आपल्या कलेचे कौतुक जास्त आकर्षित करत असते. त्यांना बसण्यासाठी एक खास जागा तयार केलेली असते. त्या आल्यानंतरच कीर्तन सुरू होते आणि ज्या महिला माईकवर भजन गातात त्यांना तर माईक सोडवतच नाही. माइक जिच्याकडे येतो तिला सूरतालातले काही समजत नसले तरी ती माईक सोडायला तयार नसते. बेसूर आवाज, चुकीचा ताल किंवा मग थरथरणाऱ्या आवाजात भजन गाण्याची जणू स्पर्धा लागते.

व्यक्तिगत स्त्री कशीही असली तरी ती जर धार्मिकतेचा खोटा बुरखा चढवण्यात यशस्वी झाली तर आपला समाज तिला ‘सदाचारी स्त्री’चा मुकुट घालण्यासही मागेपुढे पाहत नाही.

कीर्तन संपले, किटी पार्टी सुरू

कीर्तनानंतर चहा-नाश्ता मिळताच त्याच्यासोबत एकमेकांच्या चुगल्या, उणीधुणी काढायला सुरुवात होते. ज्या महिला काही वेळापूर्वी जोरजोरात भजन गात होत्या की, हे जग मोहजाल आहे, जगातील सर्व नातेवाईक, संपत्ती, खरे-खोटे सर्व येथेच सोडून जायचे आहे, त्याच महिलांमध्ये आता आपली सासू, पती, सून किंवा शेजाऱ्यांबद्दल वाईट बोलण्याची जणू स्पर्धा सुरू होते. पाहायला गेल्यास या सर्व धार्मिक कार्याच्या नावाखाली एकत्र जमलेल्या असतात, पण सत्य हे आहे की, धर्माच्या नावाखाली या सर्व केवळ आपला वेळ घालवण्यासाठी एकत्र आलेल्या असतात.

ज्या महिला मुलांची जबाबदारी किंवा आधुनिक विचारसरणीमुळे कीर्तनात सहभागी होत नाहीत, त्यांना धार्मिकतेचा बुरखा परिधान केलेल्या या महिला बरेच उपदेश करतात. पूजापाठ न केल्यामुळेच जीवनात कष्टाचा सामना करावा लागत आहे, असे सांगतात. दुर्दैवाने आपल्या समाजात पुरोगामीपणापेक्षा रूढीवाद आणि अंधविश्वासाला अधिक महत्त्व दिले जाते. कदाचित हेच कारण आहे की ज्या महिलांकडे काहीही काम उरलेले नसते त्या विदेशी महिलांप्रमाणे आपल्या आसपासच्या समाजात सुधारणा, स्वच्छता आणि समाज सुंदर करण्याऐवजी कीर्तनात वेळ घालवणे पसंत करतात.

बृहन्नारदीय पुराणात असे सांगितले आहे की :

संकीर्तनध्वर्नि श्रृत्वा ये च नृत्यतिंमानवा:।

तेषां पादरजस्पर्शान्सद्य: पूता वसुंधरा॥

अर्थात जे देवाच्या नामस्मरणाचा आवाज ऐकताच भक्तिभावाने लीन होऊन नाचू लागतात त्यांच्या चरणस्पर्शाने पृथ्वी पवित्र होते. यातूनच प्रेरणा घेऊन चैतन्य महाप्रभूंनी सामूहिक कीर्तन प्रणाली सुरू केली. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी याच हरिनाम संकीर्तनाचा प्रसार जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत केला.

जर वरील श्लोकांचा अर्थ खरा मानला तर इतक्या ठिकाणी कीर्तन केल्यामुळे आतापर्यंत पृथ्वीचे कितीतरी भले व्हायला हवे होते. पण पृथ्वी तर दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. येथील नैसर्गिक ठेवा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यावर प्रदूषणाचा दुष्परिणाम होत आहे…या सर्वांवरील उपाय खरोखरच कीर्तनात आहे का?

हे स्पष्ट आहे की जर आपण आपले जीवन सुंदर बनवू इच्छित असाल तर या जगाला अतिउत्तम बनवावे लागेल आणि आपल्या पृथ्वीला सुधारायचे असेल तर कीर्तनात वेळ वाया घालवण्याऐवजी काम करण्याची आवश्यकता आहे. समाजाला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक विचारांना आपलेसे करावे लागेल.

हग मी डियर

* किरण आहुजा

खाद्याला मिठी मारणे किंवा एखाद्याकडून आलिंगन मिळणे ही सर्वात आनंददायक भावना आहे. ही अशी भावना आहे, जी कोणत्याही मनुष्याच्या हृदयाच्या खोलीला स्पर्श करते. कितीही त्रासलेले असलात तरी कुणा आपल्या जवळच्या माणसाला मिठी मारून खूप छान वाटते. यालाच जादूची मिठी म्हणतात.

भले ही आपण आपल्या जोडीदाराच्या बाहूमध्ये असलात किंवा आपल्या मुलाला मिठी मारली असेल किंवा आपण आपल्या मित्रालाच जादूची मिठी दिली असेल, एखाद्याला मिठी मारणे किंवा कुणाकडून आलिंगन मिळणे आपल्याला नेहमी चांगुलपणाची आणि आनंदाची जाणीव करून देते. आपल्याला सुरक्षितता आणि प्रेमाचा अनुभव होतो.

जादुई मिठी

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य होते, जेव्हा संजय दत्त आणि सुनील दत्त पहिल्यांदाच एकमेकांना मीठी मारतात. या चित्रपटात सुनील दत्तचा संवाद होता, ‘‘आपल्या आईला नेहमीच जादूई मिठी देत आलास, आज वडिलांनाही दे.’’ त्यावेळी दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात.

या चित्रपटात ज्या प्रकारे मुन्नाला पारंपारिक पद्धती ऐवजी प्रेम, आपुलकी आणि जादूई मिठीने रूग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करताना दाखवले आहे, ते खरोखर दर्शविते की एखाद्याला मिठी मारल्याने किती प्रभाव पडतो.

आपण म्हणू शकतो की मिठी मारणे, केवळ भावना व्यक्त करण्यासाठीच नाही तर हेल्थ बूस्टरदेखील आहे आणि ही गोष्ट वैद्यकीय शास्त्रानेदेखील सिद्ध झाली आहे. हृदयापासून मारलेली एक मिठी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपल्याकडे सामाजिक संवाद आणि स्पर्श करण्याच्या फारच कमी संधी आहेत कारण आपण एकटे आणि व्यस्त आयुष्य जगतो, तर थेरपिस्ट म्हणतात की जगण्यासाठी आपण १ दिवसातून ४ वेळा मिठी मारली पाहिजे.

जर आपल्याला स्वत:बद्दल चांगले वाटून घ्यायचे असल्यास, आपला तणाव कमी करू इच्छित असल्यास, आपले संभाषण प्रभावी बनवू इच्छित असाल, आनंदी राहू इच्छित असाल आणि याशिवाय निरोगी आयुष्य जगू इच्छित असाल तर मग मिठी मारणे आणि हृदयाशी घेणे दोन्ही करण्याची हीच योग्य वेळ आहे.

केवळ फायदे

आपल्या शरीराच्या त्वचेत लहान-लहान प्रेशर पॉईंट्स आहेत, ज्यास पॅसिनीयन कॉर्पसल्स म्हणतात. या पॉइंट्समुळे शारीरिक स्पर्श जाणवतो आणि मेंदूपर्यंत व्हॅगस मज्जातंतूद्वारे सिग्नल पोहोचतो. व्हॅगस मज्जातंतू हृदयासारख्या शरीराच्या अनेक भागाशी जोडलेले असतात. हे ऑक्सिटोसिन रिसेप्टर्सशीदेखील जोडलेले असतात आणि ऑक्सिटोसिन (हॅप्पी हार्मोन) ची पातळी वाढवतात.

एखाद्याला मिठी मारल्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन स्त्राव होऊ लागतो आणि यामुळे आपल्याला खूप आराम मिळतो आणि शरीरात स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे आपल्याला हृदयरोग किंवा हृदयविकाराचे झटके येण्याचा धोका कमी होतो.

* नवजात मुलास हॅग केल्याने मुलाचा शारीरिक आणि मानसिक विकास सहजपणे होतो. याशिवाय मिठी मारणे मुलाला मानसिक मनशांती देते, ज्यामुळे मुलाला हे समजते की कोणीतरी त्याच्या जवळ आहे आणि ही भावना मुलाचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व वाढीसाठीदेखील फायदेशीर आहे.

* मीठी मारल्याने ताण कमी होतो. याव्यतिरिक्त, मिठी मारल्याने इंफेक्शन होण्याचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार ताणतणावामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते, परंतु मिठी मारल्याने ती पुन्हा पूर्ववत होऊ शकते. ज्यामुळे ताण-तणावाबरोबरच इंफेक्शनही दूर होते.

* हॅग केल्याने, शरीरात वाहणाऱ्या रक्तात ऑक्सिटोसिन हार्मोनचा स्त्राव होतो, ज्यामुळे वाढलेला रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे मनुष्याचा तणाव आणि चिंताग्रस्तपणा टळतो. यासह, मेंदूच्या नसा मजबूत होतात आणि स्मरणशक्ती वाढते.

* सेरोटोनिन नावाचा न्यूरोट्रांसमीटर, जो आपला मुड बनने-बिघडण्यास कारणीभूत असतो, तो मिठी मारल्याने वाढतो. हे संप्रेरक उदासीनतेशी संबंधित आहे. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा आपला मूड त्वरित खूप चांगला होतो.

* संवाद सामान्यत: शब्दांद्वारे किंवा चेहऱ्यावरील हावभावातून उद्भवतो, परंतु शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की एक अज्ञात माणूस कुणा दुसऱ्या व्यक्तीस, त्याच्या शरीराच्या वेगवेगळया भागांना स्पर्श करून अनेकप्रकारच्या भावना व्यक्त करू शकतो. या भावना राग, चिडचिडेपणा, प्रेम, कृतज्ञता, आनंद, दु:ख आणि सहानुभूतीसारख्या असू शकतात. मिठी मारणे हा एक अतिशय आरामदायक आणि हृदयास मन:शांती देणारा स्पर्श आहे.

आपल्या जोडीदाराला मिठी मारल्याने परस्पर संबंध वाढतात. शारीरिक स्पर्शाने आपणास एकमेकांशी अधिक कनेक्ट  असल्याचे जाणवते, आत्मीयता वाढते,    निष्ठेची भावना वाढते आणि परस्पर विश्वास वाढतो जो केवळ शब्दांद्वारे व्यक्त केला जाऊ शकत नाही.

* संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की शारीरिक स्पर्शात वेदना कमी करण्याची क्षमता आहे. अशा लोकांना ज्यांना फिब्रोमायल्जियाच्या, जी एक प्रकारची शारीरिक वेदना असते, उपचारासाठी शारीरिक स्पर्श दिला गेला आणि यामुळे त्यांची वेदना आश्चर्यकारकपणे कमी झाली.

* जेव्हा आपण एखाद्यास मिठी मारता तेव्हा यामुळे त्यांच्या शरीरात रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी आणि प्रवाह योग्य राहतो. यामुळे हृदयाशी संबंधित आणि ब्लड प्रेशरच्या आजारांचा धोका कमी होतो.

* हग केल्याने एखाद्याला मनापासून आनंद होतो, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संशोधनानुसार, आपण एखाद्या जवळच्या माणसाला मिठी मारल्याने आपल्या वेदनेत बराच आराम जाणवतो. याशिवाय एखाद्याचा प्रेमाने हात धरल्यासही वेदना कमी होते.

आपण आपल्या प्रेमी जोडीदारासह राहत असल्यास किंवा विवाहित जोडपे असल्यास आपण आपल्या जोडीदारास जास्त काळ मिठी मारावी. याने आपल्या दोघांनाही आनंद मिळेल आणि आपल्यातील जवळीक वाढवेल. कदाचित आपले परस्परांतील भांडणदेखील केवळ एका मिठीनेच दूर होईल.

एखाद्याला मिठीत घेण्याने खरोखर छान वाटते. मिठी मारल्याने आपल्याला स्पेशल फील होते आणि कोणाला स्पेशल फील करणे आवडत नाही.

बहरणारी सेकंड इनिंग

* शैलेंद्र सिंह

फॅशन, मॉडेलिंग आणि अभिनयासाठी पूर्वी स्त्रियांचे वय २० ते ३० पर्यंतच योग्य मानले जात होते. पण आता ३५ व्या वर्षांनंतरही स्त्रिया स्वत:ला एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी समजत नाहीत. संधी मिळाल्यावर चंदेरी पडद्यापासून ते रॅम्प शो, कॅटवॉक आणि मॉडेलिंगमध्येही त्या सेकंड इनिंगची मजा घेत आहेत.

हा बद्दल फक्त बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिला नसून लहान मोठ्या शहरातील घरगुती स्त्रियासुद्धा यामध्ये मागे राहिलेल्या नाहीत. यामुळेच देशात सौंदर्य, फॅशनेबल कपडे आणि वेलनेसचा व्यवसाय सर्वात अग्रेसर आहे.

हेमामालिनी, माधुरी दिक्षित, मलायका अरोरा, काजोल, जुही चावलाच नाही तर लहान मोठ्या शहरात राहणाऱ्या स्त्रियासुद्धा आता वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आधीपेक्षाही चांगले काम करत आहेत. फिटनेस आणि सौंदर्य पाहता त्या आधीपेक्षाही अधिक सुंदर आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. हेच कारण आहे की हल्ली लहान मोठ्या सर्वच शहरात ‘मिसेस’ म्हणून वेगलेगळ्या स्पर्धांचे आयोजन होऊ लागले आहे. लग्नानंतर स्त्रिया इतर काही सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असत. आता फॅशन, ब्युटी, रॅम्प शो आणि मॉडेलिंगमध्येही त्या त्यांचे सौंदर्य आणि फिटनेसची कमाल दाखवत आहेत.

याबद्दल मिळालेल्या माहितीवरून समजते की लग्नानंतर करिअर, कुटुंब, मुलांचे ताणतणाव यामुळे स्वातंत्र्यावर गदा यायची. ३५ व्या वर्षी किंवा त्यानंतर साधारणत: सर्व बाबी सुरळीत झालेल्या असतात आणि मानसिकदृष्ट्या थोडी मोकळीक मिळालेली असते आणि याच कारणामुळे हल्लीच्या काळात महिला वयाच्या दुसऱ्या टप्प्यात जास्त सक्रिय दिसू लागल्या आहेत.

आणि हे फक्त रॅम्प आणि ब्युटी शो पुरतं मर्यादित नाही. आज हॉटेलांमध्ये होणाऱ्या पार्ट्यां पाहिल्या तर कळून येते की सर्वात जास्त पार्ट्यांचे आयोजन स्त्रियांकडूनच केलेले असते. त्याच अयोजक असतात आणि त्याच सहभागीसुद्धा होतात. आधी किट्टी पार्टी फक्त तंबोला खेळण्यापुरतीच मर्यादित होती. पण आता किट्टी पार्टी  ग्लॅमरस होऊ लागली आहे. यामध्ये थीम पार्टीचे आयोजन केले जाते. पार्टीची थीमसुद्धा काही अशाप्रकारे ठरवली जाते की त्यामध्ये महिला त्यांचा फिटनेस आणि सौंदर्यही दाखवू शकतील. थीम पार्टीमध्ये पूलपार्टीसुद्धा असते. तिथं महिला स्विमवेअर परिधान करून येतात. कधी तर स्कर्ट घालून येण्याची वेगळी थीम बनते. थीम पार्टीमध्ये जेव्हा विजेत्यांची निवड होते, तेव्हा कुणाचा स्कर्ट किती शॉर्ट होता, कोणी कशाप्रकारचे स्विमवेअर घातले होते हेही पाहिले जाते.

फिटनेसची कमाल

फिटनेसमुळे महिलांमध्ये हा बदल घडून आला आहे. फिटनेसचे प्रमाण पाहिले तर पुरूषांपेक्षा स्त्रियाच आपल्या फिटनेसवर जास्त लक्ष देऊ लागल्या आहेत. जिमपासून ते ब्युटी पार्लरपर्यंत आणि स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरांपासून ते प्लॉस्टिक सर्जनपर्यंत या स्त्रिया फेऱ्या मारू लागल्या आहेत. त्यांच्या याच मानसिकतेमुळे आज सौंदर्य आणि फिटनेससाठी मदत करणाऱ्यांचा व्यवसाय भरभराटीस आला आहे. कुठल्याही महिलेला हल्ली जरा जरी फॅट वाढले तरी त्यांना भीती वाटू लागते आणि मग त्या काहीही करून स्वत:चे वजन कमी करण्याचा प्रयत्न करू लागतात. माधुरी दिक्षित, मलायका अरोरा, काजोल, जूही चावला अशा स्त्रिया यांच्या आदर्श असतात. त्यांना पाहून त्या स्वत:ला त्यांच्याप्रमाणे बनवू पाहतात.

लोभसवाणी सेकंड इनिंग

लग्नाच्या २० वर्षांनंतर मिसेस यूनिवर्सपर्यंत मजल मारणाऱ्या रश्मि सचदेवा पहिल्या नॉन बॉलिवूड सेलिब्रिटी बनल्या, ज्यांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कारपेटवर वॉक करण्याची संधी मिळाली.

त्या म्हणतात, ‘‘जर आम्ही थोडे मागे वळून पाहिले तर आम्हांलाही जाणीव होते की आम्ही आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहोत. हा फरक आमच्यात निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे झाला आहे. आज आम्ही निरनिराळे डिझायनर ड्रेस घालू शकतो. आम्हांला असे कधीही वाटत नाही की आम्ही आजाच्या काळातील मॉडेलपेक्षा फिटनेसमध्ये कुठेही कमी आहोत. जे ड्रेस त्या परिधान करतात, आम्हीही तसे ड्रेस परिधान करू शकतो. त्यांच्या आमच्या साइजमध्येही काही फरक आढळत नाही.

‘‘मी पूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून गेले आहे. प्रत्येक ठिकाणी मी तेथील महिलांशी बोलले. त्यांचे विचार ऐकले तर आढळले की हा बदल घरोघरी झालेला आहे. त्या महिला रॅम्पवर जरी नसल्या तरी घरातही त्या आधिक सुंदर व फिट राहू लागल्या आहेत. याचे सर्वात मोठे कारण आहे मिडिया. विशेषकरून महिलांमध्ये वाचली जाणारी मासिके. ज्यामुळे हा बदल शक्य झाला आहे. घरोघरी झालेल्या जागरूकतेमुळे प्रत्येक महिलांची सेकंड इनिंग अधिक सुंदर झालेली आहे आणि यामुळेच कापड व्यवसायात मोठा बदल घडून आलेला आहे. तिथे डिझायनर त्यांना डोळ्यांसमोर ठेवून ड्रेस तयार करू लागले आहेत.’’

फिटनेसपासून सर्जरीपर्यंत

पूर्वी अनेक प्रकारच्या समस्यांमुळे महिला फॅशन करिअरमध्ये येण्यास बिचकत असत. पण आता फिटनेसपासून ते सर्जरीपर्यंत अनेक असे उपाय आहेत, ज्यामुळे मनाप्रमाणे सौंदर्य मिळवता येऊ शकते. आता शरीरातील कुठल्याही भागात जमा असलेले फॅट काढून टाकता येणे शक्य आहे. जसे, हिप्स, ब्रेस्ट, वेस्ट आणि हाताजवळील फॅटमुळे शरीर बेढब होते. हे दूर केले जाऊ शकते. अंडर आर्म, लिप्स आणि आयब्रोपासून ते स्माइल म्हणजेच हसण्यातही सुधारणा केली जाऊ लागली आहे आणि यामुळे वयाचा परिणाम स्वत:वर दिसूनच येत नाही. बऱ्याचशा महिलांना सेकंड इनिंगमध्येही हिप्स, ब्रेस्ट, वेस्ट, अंडरआर्म्स, लिप्स किंवा आयब्रोजसारख्या बाबी योग्य करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते. अनेक प्रकारच्या व्यायामांनीच सर्व ठिक होऊन जाते.

सौंदर्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की पूर्वी लग्न आणि विशेषत: आई बनल्यानंतर शरीराच्या काही भागांचा कसाव नष्ट होत असे. आता फिटनेस आणि डाएट एक्सपर्ट यांच्या मदतीने या सर्व बाबी टाळता येऊ शकतात. आता लग्नानंतरही आई बनल्यानंतर महिला त्यांच्या मुलांना व्यवस्थितपणे ब्रेस्ट फिडिंग करतात आणि त्याचा परिणामही दिसत नाही. इतकेच नाही तर ब्रेस्ट आणि वेस्ट या भागात पडणारे स्ट्रेच मार्क्स नष्ट करता येतात.

गर्भावस्थेदरम्यानसुद्धा असे उपाय करता येऊ लागले आहेत. यामुळेच स्ट्रेच मार्क्स कमी प्रमाणात तयार होतील, असे उपाय आधी महागडे होते आणि सर्वत्र उपलब्ध नव्हते. पण आता तसे नाही. हे उपाय स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहेत.

फिगरची कमाल

ही बाब फक्त फॅटस्ची नाही. जर तुमची ब्रेस्ट, हिप्स आणि वेस्ट योग्य त्या आकारात नसतील तर त्यांची रचना योग्य केली जाऊ शकते. लहान ब्रेस्ट सुडौल केली जाऊ शकते. ज्यामुळे तुम्ही रॅम्प आणि मॉडेलिंग दरम्यान असा प्रत्येक ड्रेस परिधान करू शकता, जो एखादी नवी मॉडेल परिधान करू शकते. अंडरआर्म्सबद्दल थोडा संकोच असतोच, पण आता यासाठी विचार करण्याची गरज नाही. अंडरआर्म्सच्याखाली जमा झालेले फॅटही काढून टाकले जाऊ शकते. आणि तेथील डार्कनेसही कमी करता येणे शक्य आहे. शॉर्ट ड्रेसच नाही तर गृहिणी आता थिमवेअरसुद्धा आत्मविश्वासाने वापरू लागल्या आहेत. पूर्वीपेक्षा आता हॉटेलांमध्ये जास्त प्रमाणात स्विमिंग पूल बनले आहेत. इथे येणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या सर्वात जास्त असते. यावरून कळून येते की स्त्रिया त्यांच्या फिगरच्या बाबतीत किती सजग झाल्या आहेत.

आई बनल्याने करिअर संपुष्टात येत नाही

दिवसभर क्लिनिकमध्ये रूग्णांच्या समस्येला तोंड देणाऱ्या डॉ. मेघना सांगतात, ‘‘माझे लग्न ३० व्या वर्षी झाले. त्याचवेळी मी माझे करिअर सुरू केले. तो काळ माझ्यासाठी आव्हानात्मक होता. कारण कुटुंब आणि करिअरमध्ये ताळमेळ बसवणे खूप गरजेचे होते. यानंतर मुलगी झाल्यानंतर दिनचर्या थोडी डगमगली. मी इतर स्त्रियांप्रमाणे फिटनेस बाबतीत निष्काळजी राहू लागले.

‘‘मग मी लवकरच स्वत:ला बदलले आणि नियमित व्यायाम मेडिटेशन करू लागले आणि याचा फायदा मला माझ्या करिअरमध्येसुद्धा दिसू लागला. माझ्याकडे अनेक असे रूग्ण येतात, जे माझ्यापेक्षा वयाने १०-१२ वर्षं लहान असतात. पण फिटनेसमुळे मी त्यांच्यापेक्षा खूप लहान दिसते. मुलगी झाल्यानंतर माझे कुटुंबही पूर्ण झाले.

‘‘आई झाल्यानंतर मला कधीच हे जाणवले नाही की माझे वय ४० पेक्षा जास्त झाले आहे. कारण आजही मी स्वत:वर प्रेम करते. मी मुलीच्या संगोपनात स्वत:ला हरवू दिले नाही. आज सेकंड इनिंगमध्येसुद्धा माझ्यात तोच उत्साह आणि आत्मविश्वास आहे जो माझ्यात लग्नाआधी मला जाणवायचा. लग्न झाल्याने आणि आई बनल्याने कोणाचेही करिअर आणि ग्लॅमर संपुष्टात येत नाही.’’

शहरांमध्ये वेगाने लेडीज जिम सुरू झाल्या आहेत. इथे स्त्रिया वर्कआऊट करून स्वत:ला फिट ठेवतात. हे गरजेचे नाही की प्रत्येक स्त्रीला रॅम्पवॉक करायला पाहिजे किंवा तिला चित्रपट किंवा मॉडेलिंगच करायची असेल. हे मात्र नक्की की ती आज तिच्या कुटुंबाची साथ देते, व्यवसाय सांभाळते आणि यामुळेच तिला फिट राहाणे आवडू लागले आहे. हल्लीच्या काळात साडी आणि नेहमीचे पंजाबी ड्रेस बाद झाले आहेत. आता महिलांना डिझायनर ड्रेस आवडू लागले आहेत. पंजाबी ड्रेसही डिझायनर झाले आहेत.

फिटनेस हल्लीच्या महिलांची मोठी गरज बनली आहे आणि अशात त्या त्यांच्या आयुष्यातील सेकंड इनिंगमध्ये वेगाने पुढे चालल्या आहेत. सोशल मिडियानेही याला पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे महिला त्यांची फिगर आणि फिटनेस बाबतीत जास्त जागरूक राहू लागल्या आहेत. यात त्या कुठलीही तडजोड करत नाहीत.

गुंतवणूकीचे हे उत्तम पर्याय आहेत

* ज्योती गुप्ता

लोक बहुतेकदा सणाच्यावेळी खरेदी करण्यास किंवा नवीन सुरुवात करण्यास प्राधान्य देतात. परंतु बऱ्याचवेळा आर्थिक अडचणींमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्या गरजा लक्षात घेऊन बँका अशा अनेक ऑफर देतात, ज्यातून आपण लहानाहून लहान आणि मोठयाहून मोठया वस्तू सहजपणे खरेदी करू शकता आणि स्वस्त ईएमआयचा फायदा घेऊ शकता.

येथे आम्ही आपल्याला अशी माहिती देत आहोत, जी आपल्याला गुंतवणूक करण्यात मदत करेल :

१० टक्के कॅशबॅक

उत्सवाच्या निमित्ताने अनेक बँकांनी खरेदीवर १० टक्के कॅशबॅकची ऑफर दिली आहे. काही बँकांचे बऱ्याच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सबरोबर टायअप्सदेखील असतात. ही कॅशबॅक केवळ मर्यादित उत्पादन आणि निश्चित रकमेवर असते. म्हणूनच खरेदी करताना मर्यादा अवश्य लक्षात ठेवा, तरच आपण या ऑफरचा लाभ उठवू शकाल.

पैशांशिवाय खरेदी करा

काही बँका पैसे न भरता खरेदी करण्याची सुवर्ण संधी आपल्या ग्राहकांना उत्सवाची भेट म्हणून देतात. या ऑफरनुसार ग्राहकाला खरेदी करताना कुठले पैसे द्यावे लागत नाहीत आणि पुढच्या महिन्यापासून ईएमआय त्याच्या डेबिट कार्डवर प्रारंभ होते, जे ग्राहक आरामात ६ ते १८ महिन्यांत भरू शकतो.

कार न्या, पुढील वर्षी पैसे चुकवा

बऱ्याच बँकांनी ही सुविधादेखील दिली आहे, जर तुम्हाला कार विकत घ्यायची असेल तर आता कर्ज घ्या आणि पुढच्या वर्षापासून त्याची ईएमआय भरा. त्याचबरोबर महिलांसाठी व्याज दरामध्ये ०.२५ ते ०.५० टक्के अतिरिक्त सूटही दिली जात आहे.

दुचाकी दररोज ७७ रुपयांना उपलब्ध आहे

जर आपण बऱ्याच वर्षांपासून दुचाकी घेण्याचा विचार करीत असाल आणि हे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नसेल तर ही योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला कोठले डाऊन पेमेंट करावे लागणार नाही किंवा प्रक्रिया शुल्कही लागणार नाही. कर्ज मंजूर होताच काही वेळातच तुमच्या खात्यात पैसे येतील. त्याचबरोबर या योजनेंतर्गत तुम्हाला विशेष कंपनीची बाईक व स्कूटरवर २ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.

क्रेडिट कार्डने फायदे घ्या

काही बँका असे क्रेडिट कार्डदेखील लाँच करीत आहेत, ज्यांचे ईएमआय व्याज दर खूपच कमी असेल आणि आपल्याला ४.५० करोड रुपयांचे हवाई अपघात कव्हरदेखील मिळेल. तसेच, खरेदीवर तुम्हाला भरपूर सूट मिळेल.

याशिवाय काही खास क्रेडिट कार्डधारकांना एक असे कार्डही देण्यात आले आहे, जेणेकरून ते सर्व प्रकारच्या खरेदीवर आणि बिलाच्या देयकावर ३० टक्के सूट मिळविण्यास सक्षम असतील. यासाठी काही वार्षिक शुल्क भरावे लागेल, ज्याचे ५० टक्के परत केले जातील. तसेच आपल्याला बँकेकडून ब्रांडेड भेटवस्तूदेखील मिळतील.

कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात

दिवाळीनिमित्त ग्राहकांना मोठी भेट देताना अनेक बँकांनी रेपो दरांशी जोडल्या गेलेल्या किरकोळ कर्जाच्या व्याज दरामध्ये ०.२५ टक्क्यांपासून ०.१० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. ज्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्जासह सर्व किरकोळ कर्जे स्वस्त झाले आहेत. तर तुम्हीसुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकता.

येथे गुंतवणूक करू शकता

बहुतेक लोक सणाला पैशांची उधळपट्टी करतात. यामध्ये ते कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लेटेस्ट गॅझेट आणि सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देतात, खरेतर आपण आपल्या पैशाची अशा ठिकाणी गुंतवणूक करावी, जेणेकरुन आपल्याला भविष्यात लाभ मिळतील.

येथे आम्ही तुम्हाला अशाच काही परवडणाऱ्या गुंतवणूकीच्या पर्यायांबद्दल सांगत आहोत.

कर्जाची परतफेड करून ओझे हलके करा : समजा आपल्या कंपनीने आपल्याला चांगला बोनस दिला आहे. या रकमेने आपण कर्जाची परतफेड करू शकता, ज्यामुळे पैसे परत करण्याचा दाब कमी होईल आणि आपण तणावमुक्त होऊन आनंद साजरा करू शकाल. याला विवेकशील गुंतवणूकदेखील म्हणता येईल.

दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा : आपण बऱ्याच दिवसापासून दीर्घकाळासाठी गुंतवणूकीचा विचार करत असाल परंतु अद्याप करू शकले नसाल, तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. या गुंतवणूकीमुळे आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित असेल.

आपत्कालीन निधी : आजच्या काळात केव्हा वाईट वेळ येईल काही सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत वाईट परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण आधीपासूनच तयारी करायला हवी. म्हणूनच या उत्सवानिमित्ताने आपण आपत्कालीन निधीमध्ये गुंतवणूक करावी आणि आपल्या कुटुंबास आर्थिकदृष्टया सुरक्षित असल्याची जाणीव करून द्यावी.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे अर्थपूर्ण आहे : ईटीएफ खरेदी करून आपण चांगली गुंतवणूक करू शकता. तसेही आजच्या काळात लोक भौतिक सोने खरेदी करण्याऐवजी इतर मार्गांनी गुंतवणूक करण्यास अधिक प्राधान्य देतात. असे करून आपण आपली परंपराही निभवू शकता आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थितीदेखील मजबूत करू शकाल.

मान्सून-स्पेशल : पावसाळ्यात काय वापराल, काय टाळाल?

* दीप्ति अंगरीश

पावसाळयाच्या दिवसांत अति फॅशनपेक्षा साध्या फॅशनला महत्त्व दिले पाहिजे. उदा. असे कपडे वापरा, जे उडणार नाहीत, अन्यथा ते लवकर खराब होतात. या दिवसांत कपडयांची निवड कशी करावी, या जाणून घेऊ :

* पावसाळी फॅशनसाठी आपण आपल्या वॉर्डरोबमध्ये लाल, पिवळा, हिरवा, नारिंगी इ. रंग सामील करू शकता.

* या मोसमात इंडोवेस्टर्न लूक कॅरी करू शकता. कॉलेजच्या तरुणी वाटल्यास कॅप्री व शॉर्ट पँटसोबत कलरफुल आणि स्टाईलिश टॉपही वापरू शकतात.

* पावसाळयाच्या दिवसांत लहरिया स्टाईल खूप सुंदर दिसते. तरुणी लहरिया स्टाईलचा सलवार सूट, कुर्ता, ट्युनिकही वापरू शकतात.

* जर तुम्ही साडी नेसत असाल, तर लहरिया साडीबरोबर मॉडर्न स्टाईलचे ब्लाउजही वापरा. प्लेन लहरिया साडीसोबत उत्तम नक्षीकाम केलेले ब्लाउजही ट्राय करू शकता.

* तुम्ही जर पावसाळयात बाहेर जात असाल, तर गडद रंगाचे कपडे वापरणं टाळा. कारण पावसाळयात त्यांचा रंग जाण्याची भीती असते.

* पावसाळयाच्या दिवसांत ओलाव्यापासून वाचण्यासाठी असे कपडे वापरा, जे शरीराला चिकटणार नाहीत. या मोसमात लाइट वेट किंवा स्ट्रेचेबल लाइक्रा आणि कॉटन कपडे कमी वापरा. पॉलिस्टर आणि सिंथेटिक कपडे तर या मोसमात टाळाच.

* या वातावरणात कपडयांच्या रंगांशी मॅचिंग एक्सेसरीजचा वापरही करा. तुम्ही जर ऑफिसला किंवा कॉलेजला जाणाऱ्या असाल, तर पॉप आणि एक्सेसरिजही वापरता येऊ शकतील.

* या मोसमात फॅशनेबल दिसायची इच्छा असेल, तर सध्या बाजारात उपलब्ध गडद हलक्या कॉम्बिनेशनचे कलरफुल स्कार्फ किंवा लहरिया, बंधेज स्टाईलचे स्कार्फही वापरून पाहा.

* सलवार-कुर्ता वापरायचा असेल, तर सिंथेटिकच वापरा.

* बॉटम ड्रेस डार्क रंगाचे असतील, तर उत्तम. कारण ते ट्रान्सपरंट नसतात आणि यावरील डागही दिसत नाहीत. यांच्यासोबत अपरवेअरमध्ये ब्राइट आणि फंकी कलर्सची निवड करू शकता. ऑरेंज, पिंक, टर्क्वाइज, लेमन यलो, ब्लू, ग्रीन यांसारखे कलर्सही मूड छान बनवतात. फ्लोरल आणि स्ट्राइप्सही वापरू शकता.

* फॅब्रिकबद्दल म्हणाल, तर या वेळी लाइक्रा टाळा. हे बॉडीला चिकटतात व ह्युमिडीटीही निर्माण करतात. याऐवजी कॉटन नेट, सिल्क, पॉलिनायलॉन आणि कॉटन ब्लेंडचा वापर करू शकता. हे लवकर आकसत नाहीत.

* कॉटन आणि पॉलिस्टर कपडा टाळा, हा लवकर क्रश होतो.

* लेदरच्या चप्पल किंवा हँडबॅग पावसाळयात ओले होऊन खराब होतात. म्हणून यांचा वापर टाळा.

हेसुद्धा आजमावून पाहा

याबरोबरच गुलाबी, नारिंगी, पीच इ. रंगांच्या फिकट शेड्ससुद्धा या मोसमात आजमावू शकता. पारदर्शी रंगीबेरंगी रेनकोट, रंगीत स्पोर्ट्स शूज, वेजिस आणि गमबूट यांचा वापर या दिवसांत केला जाऊ शकतो. पोल्का प्रिंट्स, जिओमॅट्रिकल प्रिंट्स आणि फ्लोरल प्रिंट्सचे आकर्षण फॅशनप्रेमींना भुरळ घालेल. ड्रेसच्या रंगांना मॅच करणारे फॅशनेबल कलरफुल स्लीपर्सही वापरू शकता.

जीन्स-टीशर्टवर रुंद बेल्टऐवजी छोटा बेल्ट लावा. मुलींसाठी नीलेंथ फ्रॉक, फ्लोरल प्रिंट स्कर्ट इ. मान्सूनसाठी उत्तम पेहराव आहेत. सुती व शिफॉनचे ड्रेस तरुणाईच्या जास्त पसंतीस उतरतात. डोळयांच्या सुरक्षेसाठी व थकवा टाळण्यासाठी प्रत्येक मोसमात गॉगलचा वापर करा. कपडयांच्या स्टाईलसोबत केसांनाही नवीन लूक द्या.

फूटवेअर

पावसाळयाच्या दिवसांत बाजारात फूटवेअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, ज्या पावसाळ्यातही तुमची स्टाईल कायम राखतात. बाजारात रंगीत फ्लिपफ्लॉप, फ्लोटर, रेन बूट्स आणि प्लॅस्टिक चपलांच्या अनेक स्टाईल उपलब्ध आहेत. हे फूटवेअर लाल, निळे, पिवळे, हिरवे प्रत्येक रंगात पाहायला मिळतील.

याबरोबरच, फ्लॉवर प्रिंट व अन्य आकर्षक डिझाइनमध्येही फूटवेअर मिळतील, जे तुम्हाला खूश करतीलच, पण हटके लूक प्रदान करतील. जर आपण स्वत:साठी पावसाळी फूटवेअरची शॉपिंग करायला निघाला असाल, तर स्टाईलसोबत पायांना आराम कसा मिळेल, याचाही विचार करा.

विवाहबाह्य संबंधांचे कारण लैंगिक अतृप्तता तर नाही

* वेणीशंकर पटेल

काही वर्षांपूर्वी आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या एका मुख्य निर्णयानुसार कलम ४९७ रद्द करत विवाहबाह्य संबंधांना अपराधाच्या श्रेणीतून हटवण्यात आले. त्यावेळचे सीजेआय दीपक मिश्रा यांनी आपला निर्णय सुनावला की विवाहबाह्य संबंध हा एक व्यक्तिगत मुद्दा असू शकतो. तो घटस्फोटाचे कारण ठरू शकतो, पण हा अपराध नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. समाजात वाढत असलेला व्यभिचार हा समाजाची वीण तोडण्याचा कुत्सित प्रयत्न तर करत आहे, पण असाही प्रश्न निर्माण होत आहे की या वाढत्या व्यभिचार आणि विवाहबाह्य संबंधांची कारणे काय आहेत?

मानवी संस्कृतीचा विकास होताना समाजाने शारीरिक समाधान आणि सेक्स संबंधांच्या मर्यादेसाठी विवाह नामक संस्थेला सामाजिक मान्यता दिली असावी. विवाहपश्चात पती पत्नीतील सेक्स संबंध सुरुवातीला ठीक असतात, पण कालांतराने सेक्स प्रति अरुची आणि पार्टनरच्या गरजांकडे पुरेसे लक्ष न देणे ही कलहाची कारणे ठरतात.

साधारणपणे सुखद सेक्स त्यालाच मानले जाते, ज्यात दोन्ही पार्टनर्सना ऑर्गेज्मचा आनंद मिळतो. जर पतिपत्नी सेक्स संबंधांत एकमेकांना समाधानी करण्यात यशस्वी झाले तर त्यांच्या दाम्पत्य जीवनाची केमिस्ट्री ही उत्तम राहते.

राकेश आणि प्रतिभा यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. त्यांना २ वर्षांची एक मुलगीही आहे. परंतु मुलीच्या जन्मानंतर प्रतिभा मुलीच्या संगोपनातच रमून गेली. आपल्या पतिच्या लहानसहान गरजांकडे लक्ष पुरवणारी प्रतिभा आता त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली.

कधी रोमँटिक मूड असताना जेव्हा राकेश सेक्सची इच्छा व्यक्त करत असे, तेव्हा प्रतिभा त्याला या गोष्टीवरून झिडकारायची की तुला फक्त या एका गोष्टीशीच मतलब आहे. यामुळे राकेश नाराज होऊन चिडचिड करत असे. मनाला मुरड घालून तो आपली कामेच्छा दाबून टाकत होता. हळूहळू सेक्सच्या ओढीने त्याला दुसरीकडे शारीरिक संबंध निर्माण करण्याचे विचार मनात येऊ लागले. प्रतिभासारख्या अनेक महिलांचे हे असे वागणे राकेशसारख्या पुरुषांना दुसऱ्या महिलांशी संबंध प्रस्थापित करायला प्रवृत्त करतात.

ज्याप्रमाणे चविष्ट भोजन केल्यानंतर लगेचच काही खाण्याची इच्छा होत नाही, त्याचप्रमाणे सेक्स क्रियेत संतुष्ट पतिपत्नी इतरत्र सेक्ससाठी भटकत नाहीत. दाम्पत्य जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी पती आणि पत्नीला आपल्या सेक्स विषयक गरजांकडे लक्ष देणे गरजेचे असते. सेक्ससाठी पुढाकार साधारणपणे पतिकडून घेतला जातो. पत्नीनेही असा पुढाकार घेतला पाहिजे. पतिपत्नीमधील कोणीही घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करून, सेक्स संबंध स्थापित करून, एकमेकांच्या समाधानाची काळजी घेऊन विवाहबाह्य संबंध टाळता येतात.

मुलांच्या जन्मानंतरही सेक्स प्रति उदासीन राहू नका. सेक्स दाम्पत्य जीवनाचा एक मजबूत आधार आहे. शारीरिक संबंध जितके सुखद असतील, भावनात्मक प्रेमही तितकेच मधुर असेल. घरात पत्नीच्या सेक्स प्रति रुक्ष व्यवहारामुळे पती अन्यत्र सुखाच्या शोधात संबंध निर्माण करतो. कामात व्यस्त असलेल्या पतिकडून पुरेसा वेळ आणि लैंगिक समाधान न मिळाल्याने पत्नीही दुसऱ्या पुरुषासोबत संबंध निर्माण करू शकते. ज्याची परिणती दाम्पत्य जीवनातील तणाव आणि ताटातूट यात होते.

बदल स्वाभाविक असतो

मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की संबंधांतील बदल होणे हे स्वाभाविक आहे. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांत पती आणि पत्नी यांना एकमेकांविषयी जे आकर्षण वाटत असते ते कालांतराने कमी होत जाते आणि मग सुरू होतो नात्यांतील एकसुरीपणा.

आर्थिक, कौटुंबिक आणि मुलांच्या चिंता हा एकसुरीपणा अधिकच वाढवतात. मग हा एकसुरीपणा दूर करण्यासाठी पतिपत्नी बाहेर शांतता मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात, जिथे त्यांना पुन्हा एकदा आपल्या वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या वर्षांचा रोमांच अनुभवता येईल. इथूनच विवाहबाह्य संबंधांची सुरुवात होते.

एका रिसर्चनुसार असे पुढे आले आहे की वेगवेगळया लोकांमध्ये या संबंधांची वेगवेगळी कारणे असतात. कोणाशीतरी भावनात्मक पातळीवर लगाव, सेक्स लाइफमधील असमाधान, सेक्सशी निगडित काही नवीन अनुभव घेण्याची लालसा, कालानुरूप आपसांतल्या संबंधांत निर्माण झालेली प्रेमाची कमतरता, आपल्या पार्टनरच्या एखाद्या सवयीला त्रासणे, एकमेकांना जळवण्यासाठी असे करणे ही विवाहबाह्य संबंधांची कारणे आहेत.

महिलांच्या प्रति दुय्यम दर्जाची मानसिकता

भारतीय संस्कृतीत महिलांना आजही दुय्यम दर्जा दिला जातो. सामाजिक परंपरांच्या मुळाशी स्त्री द्वेष लपलेला आढळून येतो. या परंपरा महिलांना पिढयान पिढया गुलाम याखेरीज अधिक काही मानत नाहीत. त्यांना अशाचप्रकारे वाढवले जाते की त्या स्वत:च्या शरीराचा आकार इथपासून ते त्यांचा वैयक्तिक साजशृंगार यासाठीही अनुमती घ्यावी लागते.

ज्या महिला आपल्या मर्जीने जगण्यासाठी परंपरा आणि निषिद्ध मानलेल्या गोष्टी यांना आवाहन देतात त्यांच्यावर समाज चरित्रहीन असल्याचा आरोप ठेवतो. पतीला घरात चोख व्यवस्था, पत्नीचा वेळ आणि चविष्ट आणि मन तृप्त होईल असे भोजन, आनंदी वातावरण आणि देह संतुष्टी या गोष्टी हव्या असतात. पण पती तिला आवश्यक सोयी सुविधा आणि शारीरिक गरजा यांची काळजी घेताना दिसत नाही. पत्नीकडून अशी अपेक्षा केली जाते की तिने पतिच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत.

मानसशास्त्रज्ञांनुसार विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर परस्पर नात्यातील प्रेम कमी झाले आहे असे वाटले तर नात्याला एखाद्या जुन्या कपडयांप्रमाणे काढून फेकले जाते आणि नवीन कपड्यांनुसार नवीन नाती बनवणं हे काही समस्येचे समाधान नाही. आपल्या पार्टनरला समजावण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्याशी बोलून समस्या सोडवता येऊ शकते. सेक्सविषयी केलेली बातचीत, सेक्सचे नवनवे प्रकार आजमावून एकमेकांना शारीरिक संतुष्टी देऊन विवाहबाह्य संबंधांना आळा घालता येऊ शकतो.

फोरप्ले ते ऑर्गेज्म पर्यंतचा प्रवास

एका नामांकित फॅशन मॅगझिनच्या सर्वेक्षणानुसार महिलांमध्ये ऑर्गेज्मसंबंधी काही महत्त्वाची तथ्ये समोर आली आहेत. या ऑनलाइन शोधात १८ ते ४० वयोगटातील २३०० महिलांना प्रश्न विचारण्यात आले. ज्यातील ६७ टक्के महिलांनी हे मान्य केले की त्या फेक ऑर्गेज्म म्हणजे ऑर्गेज्म झाल्याचे नाटक करतात. ७५ टक्के महिलांनी हे मान्य केले की त्यांचा पार्टनर हा वीर्यस्खलन झाल्यावर त्यांच्या ऑर्गेज्मवर लक्ष देत नाही. सर्वेक्षणाचे हे आकडे दर्शवतात की बहुतांश प्रकरणांत पती आणि पत्नी हे सेक्स संबंधांत ऑर्गेज्मपर्यंत पोहोचतच नाहीत.

सेक्सला केवळ रात्री उरकण्याची क्रिया असे मानून पार पाडणे याने सहसंतुष्टी मिळत नाही. जेव्हा दोन्ही पार्टनर्सना ऑर्गेज्मचे सुख मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने सहसंतुष्टीचा आनंद मिळतो. पत्नी आणि पतिचे एकत्र स्खलन होणे म्हणजे ऑर्गेज्म असते. सुखद सेक्स संबंधांच्या यशात ऑर्गेज्मची भूमिका फार महत्त्वाची असते.

सेक्स हे शारीरिक तयारी सोबतच मानसिक तयारीनिशीही केले गेले पाहिजे आणि हे पतिपत्नीतील आपसांतील जुगलबंदीनेच शक्य होते. सेक्स करण्याआधी केलेली सेक्स संबंधी छेडछाडच योग्य वातावरण तयार करायला मदत करते. खोलीतले वातावरण, पलंगाची रचना, अंतर्वस्त्रे अशा छोटया छोटया गोष्टी सेक्ससाठी उद्दीपनाचे कार्य करतात.

सेक्सच्या वेळी कौटुंबिक समस्यांची चर्चा करणे टाळले पाहिजे. सेक्स संबंधाच्या दरम्यान छोटया छोटया गोष्टीवरून केलेल्या तक्रारी संबंधांना बोजड आणि सेक्सप्रति अरुचीही निर्माण करतात. सेक्ससाठी नवीन स्थान आणि नवीन प्रकार आजमावून संबंध अधिक दृढ करता येतात.

सेक्सची सहसंतुष्टी नक्कीच दाम्पत्य जीवन यशस्वी बनवण्यासोबतच विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठीही साहाय्यकारी ठरू शकते.

मान्सून स्पेशल : रिमझिम पावसात महाराष्ट्राची सैर

* सोमा घोष

भीषण गरमीनंतर पावसाची पहिली सर जेव्हा मुंबई आणि आजूबाजूच्या ठिकाणांवर पाण्याचा वर्षाव करते, तेव्हा झाडंझुडपं, जीवजंतूंबरोबरच मनुष्यही खू्श होऊन जातो.

पावसाळयाच्या दिवसांत मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये राहाणारे लोकसुद्धा वीकेंडसाठी काही ठिकाणी जाणं खूप पसंत करतात.

महाराष्ट्रात नेहमी टुरिझमला प्रोत्साहन मिळत आलं आहे. पावसाळयात लोणावळा, माथेरान, भंडारदरा, माळशेज घाट इ. पर्यटनस्थळं लोक सर्वात जास्त पसंत करतात.

पावसाळयात पर्यटकांची संख्या वाढण्याचं कारण येथील पाणी आणि हवा असून, त्यामुळे पर्यटकांना खूप आल्हाददायक वाटतं. ठोसेघर, अंबोली घाट, भांबावली वज्री इ. ठिकाणाचे धबधबे खूप प्रसिद्ध आहेत. याबरोबरच काही इतर आकर्षक स्थळं उदा. कुंडालिका वॉटर राफ्टिंग, लोहगडाचे ट्रेकिंग इ ठिकाणंसुद्धा पावसाळयात आकर्षणाची केंद्र बनतात, तसेच या दिवसांत समुद्रकिनारी फिरण्याचा अनुभवही मनमोहक असतो.

पावसाळ्यातील खास पर्यटनस्थळं

माळशेज घाट

सह्याद्री रांगांमधील हे हिल स्टेशन हिरवीगार वनराई आणि झऱ्यांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत आहे. हा डोंगर आपल्या नैसर्गिक सौंदर्यांने सर्वांनाच भुरळ घालतो. माळशेज घाट पुण्यापासून १३० किलोमीटर अंतरावर ठाणे आणि अहमदनगर बॉर्डरवर असून, इथे अनेक रिसॉर्टही आहेत.

लोणावळा आणि खंडाळा

हे ठिकाण मुंबईपासून खूप जवळ आहे. इथे जमीन आणि पाण्याचा अद्भूत संगम पाहायला मिळतो. पावसाळयाच्या दिवसांत येथील नैसर्गिक सौंदर्य हिरवळ व धबधब्यांनी जास्त खुलून येते. इथे विमानतळ नसल्यामुळे मुंबई किंवा पुण्यावरून बस किंवा ट्रेनने जावं लागतं. मुंबईपासून ८३ किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी ट्रेन किंवा लझरी बसेसची सुविधा उपलब्ध आहे.

भुशी डॅम, राजमाची पॉइंट आणि सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम इ. खंडाळयामध्ये फिरण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत. इथे राहाण्यासाठी महाराष्ट्र टुरिझमच्या हॉटेल्सबरोबरच अनेक हॉलिडे रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सही आहेत.

मुळशी डॅम

मुळा नदीवर बांधलेल्या या धरणापर्यंत मुंबईवरून केवळ तीन तासांत पोहोचता येतं. हा डॅम संपूर्ण महाराष्ट्रासाठी विद्युत उत्पादनाचा प्रमुख स्रोत आहे. पावसाळयात हा डॅम पाण्याने पूर्णपणे भरतो. परिणामी, पाण्याच्या वेगामुळे इथे एवढं धुकं होतं की, पर्यटकांना ढगांवरून चालल्याचा आभास होतो. हे एक नवीन पर्यटनस्थळ आहे. याच्या आजूबाजूला राहाण्यासाठी अनेक सुविधा आहेत.

कळसूबाई शिखर

सह्याद्री डोंगररांगांतील सर्वात उंचावर (५,४०० फूट) असलेल्या या कळसूबाई शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटलं जातं. इथे असलेला कळसूबाई हरिश्चंद्र गड वाइल्ड लाइफ सेंच्युरी खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण वर्षभर इथे ट्रेकर्स येतात. मात्र, पावसाळी वातावरणात येथील सुंदरता अवर्णनीय असतं. मुंबईपासून हे ठिकाण १५२.८ किलोमीटर अंतरावर आहे.

इथे वास्तव्य करण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये हॉटेल परिचय, हॉटेल राज पॅलेस, यश रिसॉर्ट, आदित्य लॉज अॅण्ड विस्टा रूम्स इ. आहेत.

भंडारदरा

भंडारदरा महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. मुंबईपासून १८५ किलोमीटर अंतरावरील या ठिकाणी पोहोचल्यानंतर, नैसर्गिक धबधबे, पर्वत-शिखर, हिरवळ, शांती आणि प्राचीन वातावरण या गोष्टी पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतात.

प्रवरा नदीच्या किनारी वसलेलं हे क्षेत्र आर्थर धबधबा आणि रंधा झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र पावसाळयाच्या दिवसांत आकर्षणाचं केंद्र बनते. मुंबईहून भंडारदऱ्याला जाण्यासाठी सर्वात उत्तम म्हणजे रस्ता मार्ग आहे.

आंबोली घाट

महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन ६९० मीटर उंचीवर आहे. सह्याद्री हिल्सवर असलेले हे ठिकाण जगातील एकमेव ‘इको हॉट स्पॉट’ मानलं जातं. येथील ‘फ्लोरा आणि फना’ची व्हरायटी खूप चांगली मानली जाते. पर्यटक इथे पावसाळयाच्या दिवसांतच फिरायला येतात. मुंबईपासून ४९१ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्यटनस्थळी कार, ट्रेन किंवा बसद्वारे जाता येतं.

इथे राहाण्यासाठी चांगले रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये वृंदावन रिसॉर्ट्स, हॉटेल सैली, साइलण्ट व्हॅली रिसॉर्ट, महाराष्ट्र टुरिझम इ. हॉटेल्स प्रमुख आहेत. नानगरता तलाव, केवलेश पॉइंट, आंबोली धबधबा, शिरगावकर पॉइंट, माधवगड किल्ला इ. प्रेक्षणीय स्थळं आहेत.

कर्नाळा

चारही बाजूला हिरवीगार निसर्गसंपदा आणि नैसर्गिक धबधब्यांनी सुशोभित झालेलं हे ठिकाण मुंबईपासून केवळ ८० किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळयात येथील ट्रेकिंग हे खास आकर्षण असते. येथे कर्नाळा किल्ला इ. सारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत.

कोलाड

मुंबई-गोवा हायवेजवळील कोलाड हे एक छोटंसं पर्यटनस्थळ आहे. हे ठिकाण चारही बाजूने छोटया-छोटया डोंगरांनी वेढलेलं आहे. कुंडलिका नदीजवळील हे ठिकाण मुंबईपासून ११७ किलोमीटर अंतरावर आहे.

येथे असलेल्या धरणातून पाणी सोडल्यानंतर कोलाड राफ्टर्स, मुंबई हाइकर्स, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन इ. राफ्टिंगची सोय करतात.

ठोसेघर धबधबा

मुंबईपासून जवळच असलेलं हे ठिकाण धबधब्यांचे सौंदर्य आणि फ्लॉवर व्हॅलीसाठी प्रसिद्ध आहे. येथील धबधबे २० मीटरपासून ५०० मीटर उंचीवरून वाहातात. पावसाळयातील शांत वातावरणात हे धबधबे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनतात. इथे जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा आधार घ्यावा लागतो. कास धबधबा, फुलांनी डवरलेलं येथील कास पठार पाहाण्यासारखी स्थळं आहेत.

लोहगड किल्ला

लोहगडचा किल्ला मुंबईच्या सर्वात जवळील पर्यटनकेंद्र आहे. याचा इतिहास जुना आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट यादव, बहमनी, निजाम, मोघल इ.नी वेळोवेळी यावर कब्जा केला. ३,३९० फुट उंचीवर असलेला हा किल्ला पावसाळयात आपलं नैसर्गिक सौंदर्य उधळतो. इथे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वेगवेगळया वनस्पती पाहायला मिळतात. हा किल्ला पुणे आणि मुंबई विमानतळापासून जवळ आहे. येथील जवळचं रेल्वेस्टेशन म्हणजे मालावली. लोणावळा आणि पुण्याला जाणाऱ्या सर्व ट्रेनमधून येथे जाता येतं. पावसाळयात ट्रेकिंगसाठी हे ठिकाण उत्तम आहे. याबरोबरच भाजे लेणी, कारला लेणी इ. ठिकाणंही पाहण्यालायक आहेत. इथे राहाण्यासाठी पुणे आणि आजूबाजूला अनेक हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत.

असे निवडा पडदे

* ललिता गोयल

पडदे घराच्या इंटीरियरचा महत्त्वाचा भाग आहेत. हे घरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांच्या मनात घराच्या सजावटीच्या बाबतीत जिज्ञासा उत्पन्न करतात. म्हणजेच प्रवेशद्वाराची खासियत हे पडदेच असतात. सप्तरंगी पडद्यांनी घराची शोभा तर वाढतेच परंतु ते खोल्यांच्या पार्टीशन व एकांतपणा राखण्यातदेखील मदतनीस ठरतात. आकर्षक पडद्यांमुळे घराच्या भिंती, दरवाजे, खिडक्या व फर्नीचरची शोभा वाढते.

चला तर मग पडद्यांची निवड जी तुमची क्रिएटिव्हिटी दर्शविण्याबरोबरच घराचं सौंदर्यदेखील कसं वाढवितं ते जाणून घेऊया :

  • पडद्यांची निवड करतेवेळी ते घराच्या भिंती, फर्नीचर, कारपेण्टशी मिळतेजुळते असावेत याची काळजी घ्या.

 

  • तुमच्या घरात ऊन येत असेल तर लायनिंगच्या पडद्यांची निवड करावी. हे उन्हापासून संरक्षण करण्याबरोबरच खोलीलादेखील सोबर लुक देतात.

 

  • तुम्ही जर २ लेयरच्या पडद्यांची निवड करणार असाल तर एक फॅब्रिक लाइट तर दुसरं फॅब्रिक हेवी निवडा जसं कॉटनसोबत टिश्यू.

 

  • दिवसा खिडक्यांचे पडदे एकत्र करून ते आकर्षक दोरीने बांधू शकता.

 

  • खोलीत ऊन येत नसेल तर खिडक्यांसाठी हलक्या रंगाच्या पडद्यांची निवड करा. अर्क शेपच्या खिडक्यांसाठी नेट, कशिदाकारी, बॉर्डर व लेसने सजलेल्या आकर्षक पडद्यांची निवड करू शकता.

 

  • किचन, बेडरूम व लिव्हिंगरूमसाठी वेगवेगळ्या पडद्यांची निवड करावी, किचनसाठी पातळ लायनिंगचे, बेडरूमसाठी कॉटनचे आणि लिव्हिंगरूमसाठी सॅटिन व कॉटन पॉलिस्टरसारख्या हलक्या मिश्रित फॅब्रिकची निवड करू शकता.

 

  • बेडरूमच्या खिडकीसाठी हलक्या म्हणजेच कॉटनच्या पडद्यांची निवड करा म्हणजे बाहेरच्या हवेची मजा घेता येईल.

 

  • पडद्यांना नवीन लुक देण्यासाठी त्यावर लेस व बटन लावा. यामुळे घराच्या सजावटीला नवीन लुक मिळेल. हवं असल्यास तुम्ही पडद्यावर घुंगरूदेखील लावू शकता. हवेसोबत पडदे हलताच ते विंड चाइमचं काम करतील.

 

  • पडद्यांची निवड करण्यापूर्वी घरातील दरवाजेखिडक्यांची लांबीरुंदी मोजून घ्या.

 

  • छोटं घर मोठं दिसण्यासाठी लेमन, ग्रीन, बेबी पिंक, स्काय ब्लू, इत्यादी रंग निवडा. छोट्या घरात गडद रंग निवडू नका.

 

फॅब्रिक व मटेरियलची निवड

  • बाजारात पडद्यांची अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत. तुम्ही तुमची आवड व गरजेनुसार निवड करू शकता.
  • अलीकडे पडद्यांमध्ये वेल्वेट, पॉलिस्टर क्रश, कॉटन, सिथेंटिक मिक्स, विस्कोस, सॅटिन सिल्कच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत.
  • राजसी लुकसाठी सिल्क व वेल्व्हेट पडद्यांची निवड करा.
  • कंटेम्पररी लुक व छोट्या घरासाठी सिल्क सॅटिन, कॉटन पॉलिस्टर, सिल्क पॉलिस्टर फॅब्रिकची निवड करू शकता.
  • * एका रंगाच्या फर्निचरसोबत प्रिण्टेड वा टेक्सचरवाले पडदे निवडा. परंतु घराचं फर्नीचर प्रिण्टेड वा टेक्सचर असेल तर एका रंगाचे पडदे निवडा. प्लेन पडद्यांचं कॉम्बिनेशनदेखीव बनवू शकता.
  • प्रायव्हसीसाठी लायनिंगचे वा हलक्या प्रकाशासाठी ट्रान्सपरण्ट पडदे निवडा.
  • तुम्ही तुमच्या जुन्या सिल्कच्या बॉर्डरवाल्या साड्यांनादेखील पडद्याचा लुक देऊ शकता.

पडद्यांची देखभाल

  • वेळोवेळी पडद्यांची स्वच्छता करत राहा. स्वच्छता पडद्यांच्या फॅब्रिकनुसार करा. वेल्व्हेट व सॅटिनचे पडदे घरी धुण्याऐवजी ड्रायक्लिनिंग करून घ्या. कॉटन व कॉटन मिक्स फॅब्रिक घरी धुऊ शकता.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें