नातं जन्मांतरीचं – दूसरा भाग

(अंतिम भाग)

दिर्घ कथा * रजनी दुबे

आत्तापर्यंत आपण वाचलंत :

आयएएसच्या कोचिंगसाठी पारूल दिल्लीतल्या एका गर्ल्स होस्टेलमध्ये येऊन राहिली होती. एकदा ती जेवायच्या सुट्टीत बाहेर पडली अन् पावसात अडकली. पावसापासून बचाव व्हावा म्हणून ती एका बंगल्याच्या व्हरांड्यात जाऊन उभी राहिली. तेवढ्यात आतून रांगत एक लहान मुलगी व्हरांड्यात आली. पारूलनं तिला उचलून घेतलं व ती घरात गेली. तिथं बाळाची आजी भेटली. मग पारूल रोजच तिला व आजींना भेटायला जाऊ लागली. तिथंच डॉ. प्रियांशुशी भेट झाली. त्यानं पारूलला लग्नाची मागणी घातली. दोन्ही घरातून या नात्याला सहर्ष स्वीकृती मिळाली. पारूल लग्न होऊन घरी आली. प्रिया, ते बाळ म्हणजे डॉ. प्रियांशुच्या दिवंगत बहिणीची मुलगी होती. बाळाच्या वडिलांचा घरात कधी उल्लेख होत नव्हता. पण पारूलला एकदा त्यांचा पत्ता मिळाला व तिनं शेखरला, प्रियाच्या वडिलांना पत्र टाकलं…

आता पुढे वाचा :

सुमारे एक महिन्यानंतर घराची डोअर बेल वाजली. बाहेर कुणी अनोळखी माणूस उभा होता. ‘‘डॉ. प्रियांशु, मिसेस पारूल व कमलाबाईंना बोलवा. कोर्टाचं समन्स आहे,’’ त्यानं म्हटलं. एव्हाना आई पण तिथं आल्या होत्या. त्यानं आमच्या सह्या घेऊन काही कागद आम्हाला दिले व तो निघून गेला. मी ते कागद जेव्हा वाचले, तेव्हा घेरी येईल की काय असं मला वाटलं. शेखरनं आमच्यावर केस केली होती. आम्ही त्याच्या नावाचा वापर प्रियंवदाच्या अनौरस मुलीचा बाप म्हणून केल्याचा आरोप आमच्यावर केला होता. त्याखेरीज त्याची बेअब्रू केली होती व त्याच्या संपत्तीवर अधिकार सांगत होतो असंही त्यात म्हटलं होतं.

एवढंच नाही तर बिचाऱ्या निरागस प्रियालाही त्यात त्यानं ओढलं होतं. प्रतिवादी क्रमांक ४ प्रिया-वय-९ महिने. (आत्मजा-वडील अज्ञात) मला एकदम धक्काच बसला, कुणी माणूस एवढा निष्ठूर कसा होऊ शकतो अन् इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकतो? मला रडूच यायला लागलं. आई पण रडत होत्या. त्या सर्व कागदपत्रात माझ्या पत्राची झेरॉक्सही टाचणीनं लावलेली होती. त्याचाच आधार घेत त्या हलकट माणसाने कोर्टात धाव घेतली होती अन् कोर्टाला विनंती केली होती की आम्ही प्रियाच्या वडिलांच्या जागी त्याचं नाव लावण्यावर प्रतिबंध करण्यात यावा. नुकसानभरपाई म्हणून त्यानं आमच्याकडून काही लाख रूपये मागितले होते. मी तर हतबद्ध झाले.

तेवढ्यात मम्मींनी फोन करून प्रियांशुला घरी बोलावून घेतलं. त्या दिवशी प्रथमच मी त्यांना इतकं संतापलेलं बघितलं…प्रथम अन् शेवटचंही.

माझे खांदे धरून गदागदा हलवत ते म्हणाले, ‘‘काय गरज होती त्या हलकटाला पत्र लिहिण्याची? मुळात तो माणूसच नाहीए. आधी प्रियंवदाला नादी लावलं. जेव्हा बाबा तिला संपत्तीत थारा देत नाहीत हे लक्षात आलं, तेव्हा त्यानं तिला गरोदर अवस्थेत एकटी टाकली अन् निघून गेला. ती बिचारी उपाशी तापाशी बेशुद्धावस्थेत पडलेली शेजाऱ्यांनी बघितली अन् तिला सरकारी इस्पितळात घेऊन गेले. माझ्या सुर्दैवानं माझा एक डॉक्टर मित्र तिथं काम करत होता. त्यानं प्रियंवदाला ओळखलं अन् मला फोन केला. मी तिथं पोहोचलो. बहिणीला घरी आणली. विचार कर, ज्या मुलीचा बाप इतका प्रतिष्ठित डॉक्टर, भाऊ परदेशातून डिग्री घेऊन आलेला, स्वत:चं हॉस्पिटल अन् ती अनाथासारखी मळकट, फाटक्या कपड्यात किती दिवसांची उपाशी सरकारी दवाखान्यात होती. आम्ही तिला घरी आणली, तोवर फार उशीर झाला होता. प्रियाला जन्म देतानाच ती मृत्यू पावली. बाबांनाही या गोष्टीचा फारच धक्का बसला…थोडे दिवस आधी आम्हाला कळलं असतं तर प्रियंवदाला आम्ही वाचवू शकलो असतो.’’

थोडे क्षण थांबून पुन्हा प्रियांशु बोलायला लागले. ‘‘मग आम्ही प्रियंवदाच्या मृत्यूची बातमी त्याला दिली. मेरठला त्याच्या घरी गेलो. बायकोच्या चितेला अग्नि देण्यासाठी त्याला विनंती केली. पण तो नालायक साफ नाही म्हणाला.’’

त्याचे वडिल म्हणाले, ‘‘हे बघा, जे व्हायचे, ते घडून गेलंय. आता या गोष्टीची उगीच फार वाच्यता करू नका. तुमच्या मुलीच्या नादात तो आम्हाला दुरावला होता. त्याला एकापेक्षा एक चांगली स्थळं सांगून येताहेत. आम्ही त्याचं लग्न करतो आहोत. इथलेच चांगले खानदानी लोक आहेत. तुम्ही निघा…उगीच तमाशे नकोत.’’ मुकाट्यानं मी व बाबा परत घरी आलो. त्या धक्क्यानं पाच दिवसातच बाबा गेले. एक दिर्घ श्वास सोडून यांनी पुन्हा माझ्याकडे रागानं बघितलं अन् म्हणाले, ‘‘त्या नरपशूचं नावही मला ऐकायला नको वाटतं अन् तू हे काय करून बसलीस?’’

मी फक्त रडत होते. बोलणार काय? केवढा अनर्थ करून बसले होते. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग मी डोळे पुसून म्हटलं, ‘‘एकदा वकील काकांचा सल्ला घेऊयात का?’’

आईही म्हणाल्या, ‘‘हो रे, एकदा वकील साहेबांना भेटून तर घ्या. मग काय करायचं ते बघू.’’

हे मुकाट्यानं माझ्यासोबत आले. आम्ही दोघं वकिलकाकांच्या घरी गेलो.

लग्नापूर्वी मी त्यांच्याकडे जातच होते. कधी कधी त्यांच्याबरोबर कोर्टातही जात होते. काका त्यांच्या ऑफिसमध्येच बसलेले होते. आम्ही सगळे कागद त्यांच्या पुढ्यात ठेवले.

त्यांनी लक्षपूर्वक सगळे पेपर्स बघितले. मग म्हणाले, ‘‘घाबरण्यासारखं काहीच नाहीए. फक्त लग्न झालं होतं हे सिद्ध करावं लागेल. लग्नाचा फोटो अन् मॅरेज सर्टिफिकेट लागेल. मुलीचं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेच.’’

प्रथमच प्रियांशु म्हणाले, ‘‘फोटो प्रियंवदानं पाठवला होता, पण बाबांनी रागानं तो फाडून टाकला. बहुधा त्यातच लग्नाचं सर्टिफिकेटही असेल.’’

वकील काका विचारात पडले. म्हणाले, ‘‘हा माणूस फारच कलुषित प्रवृत्तीचा दिसतोय. पूर्ण तयारीनिशी तो कोर्टात गेलाय…तरी हरकत नाही. लग्नाचे कुणी साक्षीदार तर असेलच ना? कोणी मित्र, मैत्रीण, भटजी, शेजारी…त्यांची साक्ष आपल्याला काढता येईल.’’

वकील काकांकडून सगळं नीट समजून घेऊन अन् साक्षीदार कसे मिळवायचे याचा विचार करून आम्ही तिथून निघालो. चार पाच दिवस सतत आम्ही प्रियवंदाचे मित्रमैत्रीणी आणि शेजारी शोधत होतो. पण दिल्लीसारख्या महानगरात ते काम सोपं नव्हतं. किती मंदिरं, किती देवळं, पंडित, भटजींना विचारलं. प्रियंवदाच्या मित्र मैत्रिणींना तर तिच्या प्रेमप्रकरणाची व लग्नाचीही कल्पना नव्हती. प्रत्येकाचं म्हणणं होतं की ती इतकी शांत अन् सज्जन मुलगी होती की शेखरसारख्या मुलाबरोबर तिचं प्रेमप्रकरण असणं शक्यच नाही. शेखरच्या काही मित्रांनां ती दोघं बरोबर फिरायची एवढं ठाऊक होतं, पण लग्नाबद्दल माहीत नव्हतं. पूर्वी जिथं प्रियंवदा राहत होती अन् ज्या शेजाऱ्यांनी तिला इस्पितळात दाखल केलं होतं, ती माणसंही आता तिथं राहत नव्हती. सात दिवस सतत भटकल्यानंतर आम्ही पुन्हा वकील काकांसमोर होतो. आमच्याकडे एकही पुरावा नव्हता. प्रियाच्या जन्माचं प्रमाणपत्र होतं, पण त्यावरच शेखरनं आक्षेप घेतला होता की स्वत:चं इस्पितळ असल्याचा फायदा घेऊन प्रियांशु त्यांना कारण नसताना प्रियाचे वडिल असल्याचं म्हणताहेत. काय करावं तेच आम्हाला सुचत नव्हतं.

वकील काका म्हणाले, ‘‘कोर्टात फक्त पुरावे लागतात. शेखरनं आधीच सगळी फिल्डिंग सज्ज करून ठेवली आहे. त्याला खोटा ठरवायला आपल्याकडे काहीच पुरावा नाहीए.’’

मला खरंतर बिचाऱ्या प्रियंवदाचा खूपच राग आला. दिल्लीसारख्या शहरात राहणारी, श्रीमंत घरातली मुलगी इतका मूर्खपणा कसा करू शकते. कुठल्याही पुराव्याशिवाय लग्न केलं…मूल होऊ घातलेलं अन् नवरा सोडून गेल्यावर मुकाट उपाशी राहिली, पण आता चिडून रागवूनही उपयोग नव्हता. ‘‘आपण प्रोटेस्ट करू शकतो,’’ असं वकील काका म्हणाले.

‘‘तो कोर्टात जिकंला तर काय होईल?’’ प्रियांशुनं विचारलं.

‘‘प्रियाला बाप म्हणून शेखरचं नाव लावता येणार नाही…अन् त्याच्या इस्टेटीत वाटा मिळणार नाही,’’ वकील काकांनी समाजावलं.

काही वेळ विचार करून प्रियांशु म्हणाले, ‘‘प्रियाला बाप म्हणून त्याच्या नावाची गरजच नाहीए अन् संपत्तीचं म्हणाल तर बाबांनी प्रियंवदाच्या नावानं ठेवलेली संपत्तीच इतकी आहे की प्रियाला कधीच आयुष्यात दहाद भासणार नाही.’’

‘‘मग तर सोपेच झाले,’’ वकील काका म्हणाले, ‘‘तुम्ही कोर्टात जाऊच नका. हजर राहिला नाहीत तर कोर्ट एकतर्फी डिक्रि त्याला देईल.’’

मला हे खरं तर पूर्णपणे पटलं नव्हतं. पण आम्हाला दुसरा काही पर्यायही उपलब्ध नव्हता. जेव्हा जेव्हा मी प्रियाला बघायचं, तेव्हा तेव्हा मला त्या नोटीशीमधला (आत्मजा-वडील अज्ञात) हे शब्द फारच खटकायचे. मी शेखरला ते पत्र लिहिण्याचा भोचकपणा केला नसता तर ही वेळच आली नसती. दिवस सरतच होते. एक दिवस टपाल आलं त्यात शेखरचं पत्र अन् कोर्टाच्या निर्णयाची कॉपी होती. त्यात प्रिया शेखरची मुलगी नाही अन् मी, आई व प्रियांशुनं तिचे वडिल म्हणून शेखरचा उल्लेख करू नये अशी तंबी होती. शेखरनं अगदी शिस्तबद्ध डाव टाकला होता.

मी बराच वेळ ती पत्रं हातात घेऊन बसून होते. आईंना व प्रियांशुला कसं सांगावं याचा विचार करत होते. एकाएकी मला काय सुचलं तर मी प्रियाला कडेवर घेऊन सरळ वकील काकांच्या ऑफिसात पोहोचले. मी जे बोलले त्याला वकिल काकांची पूर्ण सहमती होती. परतताना माझ्या हातात काही महत्त्वाचे पेपर्स होते. मी गेल्या गेल्या ते मम्मींना अन् प्रियांशुना दाखवले. ‘‘यावर प्लीज सही करा,’’ मी म्हटलं. त्यांनी आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं. प्रियाला कवटाळत मी म्हटलं, ‘‘मी प्रियाला कायदेशीर दत्तक घेऊन माझी मुलगी म्हणून वाढवणार आहे. प्रियाचे वडिल डॉ. प्रियांशु आणि आई पारूल असणार आहे.’’

आईंना तर आनंदानं रडूच फुटलं. त्यांनी मला प्रियाला मिठीत घेऊन खूप आशिर्वाद दिले. प्रियांशुही भिजल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञता होती. आता काम सोपं होतं. आम्ही कोर्टाकडून रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रियाला दत्तक घेतलं.

आता तिच्या नावापुढे वडिलांचं नाव होतं डॉ. प्रियांशु. मला खूपच समाधान वाटलं. पण मनांत एक भीती होती की प्रिया मोठी झाल्यावर तिला जर घरातल्या गडी माणसांकडून किंवा बाहेरच्या कुणाकडून काही कळलं तर? त्याचवेळी मला बाळ होणार असल्याची चाहूल लागली. प्रियाला भावंड मिळणार याचा आनंद मला उपभोगता येत नव्हता. शेवटी आईंनी माझ्या बाबांना बोलावून घेतलं. त्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन उपचार केले. त्यांनी प्रियांशुलाही दिल्ली सोडून दूर कुठंतरी जाण्याचा सल्ला दिला. माझ्या बाबांनी सुचवलं, रायपूरला त्यांचं हॉस्पिटल आहेच. मोठं घरही आहे. प्रियांशु तिथं प्रॅक्टिस करू शकतील. प्रियांशु व बाबांनी मिळून रायपूरचं हॉस्पिटल आधुनिक करून घेतलं. रायपूरचं घरही रिनोव्हेट करून त्याला दिल्लीच्या घरासारखं करून घेतलं. माझ्या व प्रियाच्या सुखासाठी आईही रायपूरला राहायला कबूल झाल्या. एवढी सगळी तयारी झाल्यावर लहानसा प्रियंक आणि त्याहून थोडी मोठी प्रिया यांना घेऊन आम्ही रायपूरला आलो.

माहेरी आता कुणी नव्हतंच. माझे काकाकाकू मुलाकडे कॅनडाला होते. इथं कुणालाही प्रियाच्या पूर्वायुष्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. दोघं मुलं माझीच म्हणून वाढत होती. प्रिया तर आधीपासून मला आई अन् यांना बाबा म्हणत होती. या वातावरणात आम्ही लवकरच रूळलो. उत्तम डॉक्टर म्हणून प्रियांशुनंही इथं लवकरच जम बसवला.

आयुष्य मजेत चाललं होतं. दोन्ही मुलं अभ्यासात अन् इतर एक्टीव्हिटीजमध्ये अव्वल होती. आपसात दोघांचं छान पटायचं. प्रिया त्यावेळी नववीत असेल.

अवचित तिने मला प्रश्न केला, ‘‘मम्मा, आजोबा सांगत होते तुला कलेक्टर व्हायचं होतं…मग का नाही झालीस?’’ मी यांच्याकडे बघितलं. ते म्हणाले, ‘‘कलेक्टर व्हायचं होतं, पण तुझ्या मम्माला तुझी आई होण्याची फार घाई झाली होती, त्यामुळे ती आई झाली अन् मग कलेक्टर व्हायचं राहून गेलं.’’

मी म्हटलं, ‘‘बाळा, माझं स्वप्नं होतं कलेक्टर व्हायचं. पण तुझे बाबा मला बघून असे माझ्या प्रेमात पडले की मला त्यांच्याशी लग्न करावंच लागलं. मग तू मिळालीस आम्हाला अन् मला आपल्या स्वप्नाचा विसर पडला.’’ बोलता बोलता मी त्या जुन्या काळात रमले.

प्रियाला काय वाटलं कुणास ठाऊक. माझ्या गळ्यात हात घालून म्हणाली, ‘‘डोंट वरी मम्मा. तुझं स्वप्नं आता तुझी मुलगी पूर्ण करेल.’’ मग भावाचा कान धरून म्हणाली, ‘‘हे बघ रे, मी आता डॉक्टर होणार नाही. डॉक्टर तुला व्हायचंय. मी आता कलेक्टर होणार. आईचं स्वप्नं पूर्ण करणार.’’

त्या दिवशीपासून ती खरंच अशा उत्साहानं अभ्यासाला लागली की मला तिचं कौतुकच वाटलं. तिनं सायन्सचे विषय बदलून आर्टसचे विषय घेतले. एम.ए. झाल्यावर यूपीएससीच्या परीक्षा दिल्या. तिथं यश मिळवल्यावर मसुरीला ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर तिची नेमणूक रायपूरलाच अतिरिक्त कलेक्टरच्या पदावर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून झाली. तिच्या बॅचची अजून सहा मुलं होती. आम्ही त्या सर्वांनाच डिनरसाठी बोलावलं. सगळीच मुलं हुशार, मनमिळाऊ, अत्यंत सुसंस्कृत अन् तरूण वयाला साजेशा उत्साहानं ओतप्रोत अशी होती. मजेत जेवणं आटोपली. माझ्या लक्षात आलं की त्यापैकी एका मुलाशी प्रियाची वागणूक थोडी वेगळी होती. तोही तिच्याकडेच अधिक लक्ष देत होता. त्यांनी आपापली ओळख करून दिली, तेव्हा कळलं होतं की त्याचं नाव शरद आहे. तो गुजरातमधला आहे. वडील आर्मीत आहेत. मी एकदम ‘मुलीची आई’ या भूमिकेतून त्याच्याकडे बघायला लागले. प्रियासाठी, तिचा नवरा म्हणून मला हा मुलगा एकदमच आवडला. दोघं एकमेकांना ओळखतात अन् बहुधा ती एकमेकांच्या प्रेमातही असावीत…मी यांना तसं बोलूनही दाखवलं. पण यांनी माझं म्हणणं पार उडवून लावलं. ‘‘अगं, किती जुन्या पद्धतीनं विचार करतेस? नव्या काळातली मुलं आहेत. आपसात मोकळेपणानं राहतात. तू लगेच प्रेमात आहेत वगैरे कसं ठरवतेस?’’ मी मात्र माझ्या मुद्दयावर ठाम होते अन् दोनच दिवसात मला त्याची प्रचिती आलीय. सायंकाळी प्रिया घरी आली तेव्हा तिच्या बरोबर शरदही होता. मी लगेच चहा फराळाची तयारी केली. ते सगळं आटोपत आलं तेव्हा शरद अन् प्रियाच्या एकमेकांना काही खाणाखुणा सुरू आहेत, असं माझ्या लक्षात आलं.

मी एकदम सावध झाले. एखादी गोष्ट हवी असली किंवा स्वत:च्या मनासारखं करून घ्यायचं असलं की दोन्ही मुलं मला आई म्हणतात. एरवी मी मम्मा असते. मी ही म्हटलं, ‘‘बोल ना, काय म्हणतोस?’’

मग शरदनं अगदी शांतपणे प्रियाच्या व त्याच्या ओळखीपासून सगळी हकीगत सांगितली. स्वत:बद्दलही सांगितलं. वडिल आर्मित ब्रिगेडियर आहेत. आईही सोशल वर्कर आहे. तो एकच मुलगा. बहीण विवाहित आहे. त्यांच्या घरी प्रिया सर्वांना पसंत आहे. त्याची प्रियाशी लग्न करण्याची इच्छा आहे. प्रियाही त्याला पसंत करते. त्याला आता माझी अन् बाबांची संमती हवी आहे. मला तर मुलगा आवडलाच होता. प्रियांशुचीही या नात्याला हरकत नव्हती…पण त्याचवेळी मला वाटलं की शरदला प्रियाच्या दत्तक प्रकरणाबद्दल माहिती असायला हवी. मी त्याला म्हटलं, ‘‘मला जरा तुझ्याशी एकट्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’’

प्रिया हसत हसत म्हणाली, ‘‘बघ रे बाबा, आई नक्की तुला ब्लॅकमेल करेल, माझ्या मुलीचा पिच्छा सोड, भरपूर पैसे देते म्हणेल, तर ते पैसे ठेऊन घे. फिल्मी हिरोसारखा पैसे नको म्हणू नकोस, उलट ती ऑफर करेल त्यापेक्षा अधिकच पैसे माग…मग आपण शॉपिंगला जाऊ.’’

मी तिच्या विनोदाकडे दुर्लक्ष करून शरदला माझ्या खोलीत घेऊन गेले. खोलीचं दार बंद करून घेतलं. कपाटातून ती जुनी फाईल काढली. त्याला सांगितलं, ‘‘प्रिया माझी व प्रियांशुची मुलगी नाही. आम्ही तिला दत्तक घेतलीय. ती प्रियंवदाची व शेखरची मुलगी आहे.’’ सगळी हकीगत सांगितली. जुनी कागदपत्रं दाखवली.

‘‘प्रियाला किंवा कुणालाच हे सत्य ठाऊक नाही. मी तर तिला स्वत:च्या रक्ताचीच मुलगी मानते, पण…तू आता तिचा आयुष्याचा जोडिदार होतो आहेस, तेव्हा तुला हे माहीत असायला हवं, या भावनेतून हे सगळं सगळं सांगितलं आहे. काय निर्णय असेल तो सांग.’’

मी जे केलं ते योग्य अयोग्य मला कळत नव्हतं. हे सगळं उघड करायला हवं होतं की नव्हतं? मुलीचं आयुष्य मी स्वत:च उद्ध्वस्त करत होते का?

मी डोळे मिटून घेतले. शरदनं माझे हात आपल्या हातात घेतले व म्हणाला, ‘‘मम्मा, यू आर ग्रेट…सगळं मला सांगितलंत, एवढा विश्वास माझ्यावर ठेवला याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रियाशी लग्न करणार हा निश्चय आता अधिकच दृढ झाला आहे. तुम्ही अगदी निर्धास्त राहा.’’

त्यानंतर शरदचे आईवडिल आमच्याकडे आले. खेळकर वातावरणात आमची भेट द्ब्राली. साखरपुडा करून घ्यायचा असं ठरलं. प्रियंकही एव्हाना त्याचं एम.एस पूर्ण करून अमेरिकेहून परतला होता. आम्ही हॉटेलातच हा समारंभ आयोजित केला होता. माझ्या बाबांचे आर्मीतले, रिटायर झालेले मित्र राज्यपाल झाले होते. बाबांनी नातीच्या साखरपुड्यात त्यांनाही बोलावलं होतं. प्रिया व शरदचे कलीग, मित्रमैत्रीणी, शरदच्या घरचे, अगदी जवळचे नातेवाईक, आमची परिचित मंडळी असे सगळे जमले होते. समारंभ खूपच आनंदात व उत्साहात पार पडला…त्याच समारंभाचे फोटो बघत असताना तो फोन आला होता.

आता मी पूर्णपणे शुद्धीवर आणि भानावरही आले होते. प्रिया कुठाय माझ्यावर रागावली आहे का ती? तेवढ्यात मुलगा जागा झाला. धडपडून उठला अन् माझ्या जवळ येत आनंदानं ओरडला, ‘‘आई… कसं वाटतंय? तुझ्या लाडक्या लेकीनं तर मला गेले चार दिवस धारेवर धरलं होतं. काल तेव्हा मी परोपरीनं समजावलं की आई आता पूर्ण बरी आहे, उद्या सकाळपर्यंत डोळे उघडेल तेव्हा कुठं बाबांना घरी घेऊन जाण्याच्या निमित्तानं तिला घरी पाठवली. दोघंही शंभरदा बजावून गेलेत की रात्री जरी आई शुद्धीवर आली तरी ताबडतोब फोन कर…’’

तेवढ्यात त्याची नजर दाराकडे गेली अन् तो म्हणाला, ‘‘घ्या, हे आलेच तुमचे देवदास अन् तुझी चमची…न बोलावता हजर व्हायची सवय आहे ना?’’ त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. आनंदानं चेहरा उजळला होता.

मी बघितलं दारातून प्रिया अन् प्रियांशू त्वरेनं आले अन् माझ्या बेडशेजारी येऊन उभे राहिले. प्रिया तर माझ्या छातीवर डोकं ठेवून रडायलाच लागली…‘‘काय हे आई, किती घाबरवून सोडलंस गं! माझ्या लग्नाच्या दु:खानं जर असं झालं असेल तर मला लग्नच करायचं नाही…’’

मुलगा लगेच म्हणाला, ‘‘पुरे गं, आईला आनंद सहन झाला नाही. तिला खूपच आनंद झालाय…खरं तर आनंदानं हार्ट अटॅक मला यायचा की चला, घरावरचं एक संकट शरदकडे गेलं. आता घरावर एकछत्र साम्राज्य माझं!’’

प्रियानं खोट्या रागानं त्याचा कान धरला. ‘‘मोठा आलाय अमेरिकेतून शिकून. चार दिवस लावलेस आईला बरं करायला…आधी डॉक्टरी तर कर नीट. मग कर घरावर साम्राज्य.’’

दोघांचं ते प्रेमळ भांडण बघून मला किती छान वाटत होतं. प्रिया अगदी नॉर्मल वाटत होती म्हणजे तो आज नसावा…मला थोडं निवांत वाटलं.

एका आठवड्यातच मी घरी निघाले होते. शरद गाडी चालवत होता. प्रियांशु त्याच्या शेजारी होते. प्रिया माझ्या शेजारी होती. अचानक तिनं म्हटलं, ‘‘मला कळलंय, तुला कसला धक्का बसला…का तुला अॅडमिट करावं लागलं. तो माणूस आला होता, ज्याच्यामुळे हे सगळं घडलं.’’

मी दचकून तिच्याकडे बघितलं. प्रियांशुनं मागे वळून बघितलं अन् म्हणाले, ‘‘होय पारूल, तो आला होता. अगं, मला एकदम समजेना काय करावं ते, पण फार बरं झालं तू शरदला सगळं समजावून सांगितलं होतंस अन् ती फाइल कुठं होती ते ही त्याला ठाऊक होतं. त्यानंच प्रियाला ती सारी कागदपत्रं दाखवली. मी प्रियाला सगळी खरी खरी हकीगत सांगितली. या दोघांनी तर त्याला असा काही झापलाय की काय सांगू. माझ्या बहिणीच्या अन् बाबांच्याही आत्म्याला शांती मिळाली असेल.’’

मला आता एकूणच सगळं काही जाणून घ्यायची उत्सुकता वाटत होती. त्याचा सगळा पैसा त्याच्या नालायक मुलांनी उधळला होता. एक कुठंतरी फरार होता. दुसरा भीक मागत होता. त्यानं विचार केला असेल की तुला धाक दाखवून पैसा मिळवता येईल. पण तू तर त्याचा फोन ऐकूनच बेशुद्ध पडलीस, हॉस्पिटलला अॅडमिट करावं लागलं. तो घरी आला तर प्रियाच सामोरी आली. तो विचार करून आला होता की मुलीकडून दर महिन्याला काही पैसे त्याला जीवन जगण्यासाठी मिळावेत. पण शरद आणि प्रियानं ते कागद त्याच्या डोळ्यापुढे नाचवले. प्रियानं तर त्याला धमकावलंच…तू कोण? मी तुझी मुलगी नाही. तू माझा बाप नाही असं कोर्टातून तू लिहून घेतलंस ना? तर मी तुला पैसे का म्हणून द्यायचे? केस आता मी ठोकते तुझ्यावर. तुझ्यामुळे माझी आई इस्पितळात आहे. आमच्या कुटुंबाला तुझ्यामुळे त्रास झालाय. एवढं बोलून प्रिया थांबली नाही. तिनं सरळ एसपीला फोन केला. पोलीस संरक्षण हवंय…ताबडतोब पोलीस आले. त्याला घेऊन गेले. दोन दिवस होता पोलीस कोठडीत.

प्रियानं मला मिठी मारली. ‘‘तुझी मुलगी काही लेचीपेची नाहीए आई. अन् आपलं नातंही तकलादू नाहीए…कुणाच्या धमकीनं ते तुटेल असं तुला वाटलंच कसं? अगं, त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता…आता कळेल त्याला…उपाशी मरेल तो…’’

माझ्या लेकीला जणू माझा चेहरा वाचता आला. मला आश्वस्त करत म्हणाली, ‘‘आई, काळजी करू नकोस. मी आणि शरदनं मेरठच्या कलेक्टरला फोन करून त्याला वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जोपर्यंत जगेल तोवर त्याला निराश्रित म्हणून पेन्शन मिळेल…अगदी उपाशी अन् रत्यावर नाही राहणार.’’

मी भरल्या डोळ्यांनी, तिच्या सुबुद्धपणाचं कौतुक वाटून तिच्याकडे बघत होते. परत मला बिलगत ती म्हणाली, ‘‘मला या जगात आणण्याचे त्याचे उपकार आहेतच ना? त्याशिवाय मला तुझ्यासारखी आई कशी मिळाली असती? तेच कर्ज फेडलंय मी. आता फक्त कृपा करून मी त्याला भेटायला जाईन किंवा याहून अधिक काही करेन अशी अपेक्षा करू नकोस.’’

मी हसून तिला कुशीत घेतली. घर आलं होतं. गाडी थांबली. प्रियानं मला सांभाळून उतरवून घेतलं अन् आधार देऊन घरात नेऊ लागली. आमचं नातं कागदावर झालं होतं पण ते रक्ताच्या नात्याहून अधिक गाढं अन् मनोज्ञ होतं…जणू जन्मांतरीचं नातं होतं.                             (समाप्त)

नातं जन्मांतरीचं – पहिला भाग

(पहिला भाग)

दिर्घ कथा * रजनी दुबे

फोनच्या घंटीमुळे डोळे उघडले, तेव्हा लक्षात आलं मी बेडवर आहे…आपल्याच हॉस्पिटलच्या रूममध्ये. मी इथं केव्हा अन् कशी आले ते आठवेना. पुन्हा फोनची घंटी वाजली अन् लख्खकन् वीज चमकावी तसं सगळं आठवलं. मी दुपारी सगळी वर्तमानपत्रं घेऊन बसले होते. त्या सगळ्या वृत्तपत्रातून माझ्या लेकीचे अन् जावयाचे फोटो आले होते. दोन दिवसांपूर्वीच आम्ही तिचा साखरपुडा खूप थाटात केला होता. त्या समारंभाला राज्यपालही आले होते. फोटो त्यांच्या सोबतचा होता. शहरातील नामांकित डॉक्टरांच्या लेकीचा साखरपुडा शरद यांच्याबरोबर झाला. दोघेही आयएएस होण्यासाठी ट्रेनिंग घेत आहेत. अशी फोटो ओळही छापलेली होती.

फोटोत मी व माझे पतीही होतो. मला खूप समाधान आणि अभिमानही वाटत असतानाच फोन वाजला. मी रिसीव्हर उचलला, तेव्हा पलीकडून कर्कश्श आवाजात कुणीतरी ओरडलं. ‘‘माझ्या पोरीला आपली म्हणवून गर्वानं फुगली’ आहेस. ती माझी लेक आहे. ते माझं रक्त आहे. मी सांगतोय येऊन तिला सत्य काय आहे ते…’’

एवढं ऐकलं अन् रिसीव्हर माझ्या हातून गळून पडला अन् मी बेशुद्ध पडले. ती आत्ता शुद्धीवर येते आहे. थोडी मान वळवून बघितलं तर माझा हल्लीच डॉक्टर झालेला मुलगा तिथंच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपलेला दिसला.

मुलगी…दिसली नाही. बाप रे! ती कुठं असेल? तो दुष्ट माणूस तिला भेटून तर गेला नाही ना? माझी पोर माझ्या काळजाचा तुकडा…माझ्या आयुष्याचा आधार…माझं सर्वस्व आहे माझी मुलगी…पण तो म्हणत होता ती त्याची आहे…तिच्या धमन्यांमधून त्याचं रक्त वाढतंय म्हणाला खरंय का ते?

पाऊस पडायला लागल्याचं आवाजावरून जाणवलं…पावसाच्या आवाजानं मन थेट भूतकाळात जाऊन पोहोचलं.

बाबांशी खूप वाद घालून, भांडूनच मी आमच्या छोट्या गावातून आयएएस होण्याच्या जिद्दीनं दिल्लीला आले होते. कोचिंग छान सुरू होतं. दुपारी दोन तास मधे वेळ असायचा. त्या वेळात मी जवळच्याच एका हॉटेलात लंच आटोपून पुन्हा क्लासला जायचे. त्या दिवशीही मी लंचसाठी निघाले अन् अवचित खूपच जोराचा पाऊस आला. जवळच्याच एका बंगल्याचं फाटक उघडं दिसलं अन् मी पळतच त्या घराच्या व्हरांड्यात जाऊन उभी राहिले. अन् मग मनात आलं की घरातल्या लोकांना माझं इथं असं येऊन उभं राहणं खटकणार तर नाही? पण पाऊस जोरात होता काय करू?

तेवढ्यात हळूहळू घराचा दरवाजा उघडला अन् आठ दहा महिन्यांची एक गोंडस मुलगी रांगत रांगत बाहेर आली. मी चकित होऊन तिच्याकडे बघत होते. ती माझ्याकडे बघून खुदकन् हसली अन् तिनं आपले चिमुकले हात पसरले. न राहवून मी तिला उचलून घेतली. मी दाराकडे बघत होते की तिची आई किंवा कुणीतरी बाहेर आलं तर मी सांगेन की बाळ पावसात जात होतं म्हणून उचलून घेतलं. पण बराच वेळ कुणी बाहेर आलं नाही, तेव्हा मीच आत जाण्याचा निर्णय घेतला. बाळाला कडेवर घेऊन मी दारातून आत आले. समोरच्याच भिंतीवर एका अत्यंत देखण्या तरूणीचा फोटो होता. त्याला हार घातलेला होता. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक वयस्कर स्त्री त्या हॉलमध्ये आली. मी त्यांना नमस्कार करून बाहेर पावसापासून बचाव करण्यासाठी मी उभी असताना हे बाळ रांगत बाहेर आलं अन् पावसात जात होतं म्हणून मी उचलून घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं.

marathi-koutumbik-katha

त्यांनी हसून मला बसायला सांगितलं. मी बाळाला खाली ठेवायला गेले तर ती मुलगी मलाच बिलगली. मला काय करू समजेना.

त्या स्त्रीनं म्हटलं, ‘‘मुली, थोडा वेळ खाली बस. तू उभी आहेस, त्यामुळे तू तिला बाहेर नेशील या लालसेने ती तुझ्याकडून माझ्याकडे येत नाहीए.’’

मी बाळासकट सोफ्यावर बसले. घर खूपच छान होतं. अभिरूची अन् वैभवाच्या खुणा सर्वत्र दिसत होत्या. जवळच टेबलावर जेवायचं ताट वाढलेलं होतं अन् त्यातलं अन्न गार झालं होतं. बाळामुळे म्हणजे प्रियामुळे त्या मावशींना जेवायला मिळालं नसावं असा मी अंदाज बांधला.

मी त्यांना म्हटलं, ‘‘मी सांभाळते हिला. तुम्ही शांतपणे जेवण घ्या.’’

त्या हसून म्हणाल्या, ‘‘हे तर रोजचंच आहे. हिला सांभाळणारी आया सध्या रजेवर आहे. हिच्या खोड्या आवरता आवरता माझं जेवण गार होतं.’’

माझ्या लक्षात आलं ही स्त्री म्हणजे बाळाची आजी आहे अन् त्या फोटोतली स्त्री म्हणजे बाळाची आई आहे. आता ही स्त्री म्हणजे त्या फोटोतल्या सुंदर तरूणीची आई किंवा सासू असणार.

माझ्या मांडीवर असलेली प्रिया माझ्या थोपटण्यामुळे झोपी गेली होती. ‘‘तिला इथं पाळण्यात झोपव,’’ मावशी म्हणाल्या.

मी हळूवारपणे बाळाला पाळण्यात झोपवलं अन् जाण्याची परवानगी मागितली.

‘‘तूच आता बोलली होतीस की लंचसाठी निघालीस अन् पाऊस आला याचा अर्थ तुझंही जेवण झालेलं नाहीए. ये आपण दोघी एकत्र जेऊयात.’’ मावशी बोलल्या.

मी प्रथम नकार दिला, पण त्यांच्या प्रेमळ आग्रहाला नकार देणं बरं वाटेना, शिवाय भूकही खूप लागली होती. त्यांनी अन्न गरम करून दोन ताटं वाढून आणली अन् मी पोटभर जेवले. जेवण स्वादिष्ट होतं. बरेच दिवसांनी घरचं जेवण मिळालं होतं. त्यामुळे पोट तुडुंब भरेपर्यंत जेवले. जेवणाचं कौतुकही केलं.

हसून मावशी म्हणाल्या, ‘‘आता रोजच तू लंचला इथं येत जा. तू भेटलीस की प्रियालाही आनंद होईल.’’

मी त्यांना विचारलं की हिची बाई किती दिवस रजेवर आहे? तर त्या म्हणाल्या, ‘‘बाईची सासू वारल्यामुळे ती गावी गेलीय. आता पंधरा दिवस तरी लागतीलच. दुसरी बाई शोधतोय, पण स्वच्छ अन् प्रेमळ शिवाय प्रामाणिक बाई मिळत नाही. स्वंयपाकाला आचारी आहे…पण बाळाला सांभाळायला कुणी स्त्रीच हवीये.’’

मला काय सुचलं कोण जाणे. मी अभावितपणे बोलून गेले, ‘‘मावशी, काळजी करू नका. मी तुमचे हे अडचणीचे दिवस निभावून नेते. मलाही हा वेळ मोकळा असतो. त्या कठीण अभ्यासक्रमाच्या ताणातून थोडा विरंगुळा म्हणून मी दोन तास तुमच्याकडे येऊन प्रियाला सांभाळेन, खेळेन तिच्यासोबत. तेवढ्यात तुमचं जेवण निवांत ओटापून घेत जा.’’

मावशींनी एका अटीवर माझं म्हणणं मान्य केले…रोजचा लंच मी त्यांच्याबरोबर घ्यायचा.

मी गमतीनं म्हटलं, ‘‘मावशी, इतका विश्वास कुणावरही टाकणं बरोबर नाही.’’

‘‘पोरी, जग बघितलं…इतकं वय झालंय. माणूस ओळखता येतो मला.’’ मावशींनी म्हटलं.

मग तर हा रोजचा नियमच झाला. लंच टाइममध्ये मावशींकडे जायचं. प्रियाशी खेळायचं, मावशींशी गप्पा मारत जेवायचं.

मावशी थोडंफार घरच्यांबद्दल सांगायच्या. त्यांचा मुलगा डॉक्टर आहे…लग्नाच्या वयाचा आहे, पण लग्नच करायला तयार नाही…घरात सून येणं गरजेचं आहे. माझी तब्येतही बरी नसते. प्रियाची काळजी वाटते वगैरे वगैरे…मलाही वाटायचं, इतकी देखणी होती यांची सून, मुलगा तिच्या प्रेमातून बाहेर पडणार कसा?

एक दिवस दुपारची घरी पोहोचतेय तोवर बाहेरूनच प्रियाच्या जोरजोरानं रडण्याचा आवाज ऐकला. धावतच आत गेले. किचनच्या दाराशी मावशी बेशुद्ध पडल्या होत्या. पाळण्यात प्रिया रडत होती. आधी तिला पाळण्यातून खाली घेतली. मावशींना चेहऱ्यावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होते. पटकन् सुचलं, मैत्रिण निशाला फोन करून डॉक्टराला पाठवून दे म्हटलं. तिला पत्ताही सांगितला. तिही ताबडतोब धावत आली. पाठोपाठ डॉक्टरही आले. मी व निशानं मावशीला बेडवर झोपवलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की बी.पी. एकदम कमी झाल्यामुळे चक्कर आली. आवश्यक उपचार करून डॉक्टर गेले. निशाही तिचा क्लास होता म्हणून निघून गेली. मी टेलिफोनजवळ एका कार्डावर मोठ्या अक्षरात लिहिलेले नंबर बघितले. गरजेच्यावेळी लागणारे ते टेलिफोन नंबर्स होते. त्यात डॉ. प्रियांशूंचा फोन नंबर सगळ्यात वर होता. आता मी त्यांना फोन केला. तो आईच्या तब्येतीबद्दल ऐकून एकदम हवालदिल झाला. ‘ताबडतोब येतो’ म्हणाला. मावशी आता शुद्धीवर आल्या होत्या. पण अजून पडूनच होत्या. त्यांचा गोरापान चेहरा मलूष्ठ दिसत होता. चेहऱ्यावर अन् सर्वांगावर थकवा जाणवत होता. या वयात लहान बाळाची जबाबदारी खरोखर फार अवघड असते.

माझी आईही माझ्या लहानपणीच वारली होती. बाबांनी दुसरं लग्न केलं नव्हतं. पण माझ्या काकीनं माझी जबाबदारी घेतली अन् खूप प्रेमानं मला वाढवलं…कदाचित त्यामुळेच मला प्रियाविषयी विशेष लळा होता…इथं मावशींची गोष्ट वेगळी होती. त्यांची तब्येत अन् वय बघता त्यांच्या मुलानं लग्न करणं गरजेचं होतं. मी विचारातच होते, तेवढ्यात, दारातून एका देखण्या तरूणानं घाईघाईनं प्रवेश केला. धावतच तो बेडपाशी पोहोचला. ‘‘आई काय झालं तुला? आता कशी आहेस? मला लगेच बोलावलं का नाही? फोन केला असता…’’

मला त्याच्या त्या बोलण्याचा रागच आला. मला तो फार मानभानी वाटला. मी जरा तडकूनच बोलले, ‘‘आता मारे इतकी काळजी दाखवताय…त्या लहान अजाण पोरीची काळजी घ्यायची जबाबदारी आईवर टाकताना काही नाही वाटलं? का नाही दुसरं लग्न करून घेत? तुम्हाला काय वाटतं सगळ्याच सावत्र आया वाईट असतात? मिस्टर, जगात चांगली माणसंही आहेत…मला तर वाटतं तुम्ही स्वत:ला देवदास समजताय अन् आपल्या देवदासी दु:खात तुम्हाला आईचं दु:ख लक्षात येत नाहीए.’’

डॉक्टर प्रियांशुचा आश्चर्यानं वासलेला ‘‘आ’’ बंद होईना. कॉलेजात मी उत्तम डिबेटर, उत्तम वक्ता म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी ज्या आक्रमकपणे मी बोलायची तसंच आत्ताही बोलून गेले. ‘‘बोला ना? का नाही म्हणताय दुसऱ्या लग्नाला?’’

एकाएकी माझ्या लक्षात आलं की डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा विस्मय नाहीसा होऊन तिथं आता मिश्किल, खट्याळ हसू उमटलं होतं. तेच मिश्किल हास्य ओठांवर असताना ते म्हणाले, ‘‘अगं बाई, दुसरं लग्न कधी करणार? अजून तर माझं पहिलंच लग्न झालं नाहीए…’’

‘‘म्हणजे?’’ मी आश्चर्यानं मावशींकडे बघितलं. आता ‘आ’ वासायची माझी पाळी होती.

एव्हाना मावशी हळूहळू उठून बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरही तसंच मिश्किल हास्य होतं. त्यांनी सावकाश बोलत मला समजावलं की प्रियांशु त्यांचा मुलगा आहे. प्रिया त्यांच्या मुलीची प्रियंवदाची मुलगी आहे, जिचा फोटो हॉलमध्ये लावलेला आहे. आता माझी चांगलीच गोची झाली होती. मी ओशाळून त्यांना ‘येते’ म्हटलं अन् निघायची तयारी केली.

इतक्या सगळ्या गोंधळात मावशीचं अन् माझं सकाळचं जेवण झालंच नव्हतं. एव्हाना संध्याकाळ ओसरून रात्र व्हायला आली होती. ‘‘तू आता जेव. आपण सगळेच जेवू. मग प्रियांशू तुला होस्टेलवर सोडून येईल.’’ मावशीनं म्हटलं.

डॉक्टरांनीही आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आचारी स्वयंपाकाला लागला. त्यानं झटपट जेवण बनवलं. तेवढ्या वेळात डॉक्टर कपडे बदलून आले.

जेवताना मी गप्प होते. प्रियांशूने म्हटलं,‘‘तुमचं कौतुक वाटतं मला. कारण तुम्ही हे अगदी बरोबर ओळखलं आहे की मला प्रियाची फार काळजी वाटते. कोणतीही मुलगी लग्न होऊन घरी येताच बाळाची जबाबदारी घ्यायला तयार होणार नाही. त्यातून म्हातारी सासू सांभाळायची…खरं ना?’’

आता मीही जरा सावरले होते. मी बोलून गेले, ‘‘असं काही नाहीए. इतका देखणा डॉक्टर, सधन घरातला मुलगा, प्रेमळ सासू हे बघून तर कुणीही मुलगी लग्न करेल तुमच्याशी.’’

माझ्या लक्षात आलं की मावशी अन् प्रियांशु पुन्हा तसंच मिश्किल हसताहेत. मला स्वत:च्या बोलण्याचा त्याक्षणी राग आला अन् लाजही वाटली. मी जेवण संपवून पटकन् हात धुतले.

तेवढ्यात प्रियांशुही हात धुवायला उठला अन् त्यानं विचारलं, ‘‘तुम्ही तयार आहात माझ्याशी लग्न करायला? कराल का माझ्याशी लग्न?’’

बाप रे! मला तर घामच फुटला.

मावशींनी सांभाळून घेत म्हटलं, ‘‘अरे, तिला लवकर सोडून ये. उशीर झाला तर बोलणी खावी लागतील.’’

प्रियांशुनं गाडी काढली. मावशींचा निरोप घेऊन मी गाडीत जाऊन बसले. होस्टेलच्या आधी एका आइस्क्रीम पार्लरसमोर त्यांनी गाडी थांबवली.

माझ्या बाजूचा दरवाजा उघडत ते म्हणाले, ‘‘अजून हॉस्टेलचं गेट बंद व्हायला अवकाश आहे. या ना, आइस्क्रीम खाऊयात. मी तर कित्येक दिवसात खाल्लं नाहीए आइस्क्रीम.’’

मी मुकाट्यानं उतरले. आम्ही आत जाऊन बसलो. त्यांनी माझी आवड विचारली.

मी चॉकलेट फ्लेवर सांगताच ते दोन आइस्क्रीम घेऊन आले. माझी नजर खाली होती, पण ते सतत माझ्याकडे निरखून बघत आहेत हे मला जाणवत होतं.

आइस्क्रीम संपल्यावर ते दिलगिरीच्या सुरात म्हणाले, ‘‘माझ्या बोलण्यानं तुम्ही दुखावला गेला असाल तर मी क्षमा मागतो. पण आईकडून जे काही तुमच्याबद्दल ऐकलं होतं अन् आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्ही इतर सामान्य मुलींपेक्षा वेगळ्या आहात. खरंतर मी अशा वेगळ्या मुलीच्या शोधात होतो. त्यामुळेच मी पुन्हा तुम्हाला लग्नाची मागणी घालतो आहे. मला ठाऊक आहे की तुमची स्वप्नं वेगळी आहेत. तुम्हाला कलेक्टर वगैरे व्हायचंय. पण लग्नानंतरही ते करता येईल. माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा असेल. प्रियावर जे निरपेक्ष प्रेम तुम्ही करता, तसं दुसरी कुणी मुलगी करू शकणार नाही…मला उत्तराची घाई नाहीए. तुम्ही विचार करा. भरपूर वेळ घ्या. तुमचा नकारही मी खिलाडूपणे स्वीकारेन. फक्त एकच अट. आई व प्रियाला मात्र नेहमीप्रमाणेच भेटत राहा.’’

काय उत्तर द्यावं मला समजत नव्हतं. त्यांनी मला होस्टेलच्या गेटपाशी उतरवलं अन् ते ‘गुडनाइट’ म्हणून निघून गेले.

आपल्या रूमवर गेल्यावर मी स्वत:ला पलंगावर झोकून दिलं. आत्तापर्यंत कुणा मुलानं अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलण्यासाठी मैत्री वाढवली तर मी त्याला असा काही झापायची की बिचारा पुन्हा बोलायचं धाडस करायचा नाही. पण आज प्रियांशुनं सरळ मला लग्नाची मागणी घातली अन् मी मुकाट ऐकून घेतलं. खरं तर मला राग यायला हवा होता अन् मला चक्क लाज वाटतेय? काहीतरी वेगळं छान छान वाटतंय. कितीतरी वेळ मी विचार करत होते. काहीच निर्णय घेता येईना, तेव्हा मी बाबांना फोन लावला. बाबांचा आवाज ऐकताच मला एकदम रडू फुटलं. ‘‘बाबा, तुम्ही ताबडतोब इथं या. मला तुमची फार गरज आहे.’’ बाबांनी नेमकं काय झालंय विचारलं तरीही मी काहीच बोलले नाही.

दुसऱ्यादिवशी बाबा आले. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. बाबांनी सगळी हकिगत शांतपणे ऐकून घेतली, मग मलाच विचारलं, ‘‘तुझी काय इच्छा आहे? मी त्या कुटुंबाला ओळखतो. प्रियांशु माझ्या मित्राचा, डॉक्टर नीरजचा मुलगा आहे.’’ बाबा स्वत:ही डॉक्टर होते.

मी म्हटलं, ‘‘मला समजतच नाहीए…म्हणून तर तुम्हाला बोलावून घेतलंय.’’

‘‘हे बघ, बेबी, एक बाप म्हणून विचारशील तर मुलगा आणि घराणं, दोन्ही उत्तम आहे. खरं सांगायचं तर इतकं चांगलं स्थळ मी ही तुझ्यासाठी शोधू शकलो नसतो. पण एक मित्र म्हणून विचारशील तर तुझी स्वप्नं यूपीएससी करून कलेक्टर व्हायचं आहे. अशावेळी लग्नाचा विचार दूरच ठेवावा लागतो. पण प्रियांशुनं तुला  लग्नानंतरही शिक्षण चालू ठेव, तो तुला सपोर्ट करेल असंही म्हटलंय, तर तू त्याला होकार द्यायला हरकत नाही.’’

मी बाबांना घेऊन प्रियांशुच्या घरी गेले. बाबांना भेटून मावशींना खूपच आनंद झाला अन् त्यानंतर दहा दिवसात मी डॉक्टर प्रियांशुशी लग्न करून, त्यांची बायको म्हणून त्या घरात आले. मावशींना मी आता आई अन् मम्मी म्हणत होते. सगळा वेळ माझ्यासोबत राहायला मिळत असल्यानं प्रियाही खुश होती.

खूपच दिवस गेले. खरं तर खूपच भराभर गेले. मी माझ्या संसारात खूपच रमले होते. आई अन् प्रियांशु मला अभ्यासाला बस म्हणून दटावत असले तरी मी अभ्यास करणं टाळतच होते. घर नित्य नव्या पद्धतीनं सजवणं, प्रियाला सांभाळणं आणि तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करून प्रियांशु व आईंना खायला घालणं यातच माझा वेळ जात होता. बाबांचे एक मित्र दिल्लीत वकिली करत होते. माझं कोचिंग सुरू असताना मी दर आठवड्याला त्यांच्याकडे जात होते. ते लग्नाला आले, तेव्हाही त्यांनी मला त्यांच्याकडे येत राहाण्याबद्दल सांगितलं होतं. पण मी त्यांच्याकडेही जात नव्हते. आपल्या या नव्या जगात मी खूपच आनंदात होते अन् तेवढ्यात माझ्या सुखाला दृष्ट लागली.

आमच्या बंगल्यातली प्रियंवदाची खोली तिच्या लग्नापूर्वी जशी होती, तशीच आईंनी ठेवली होती. मी विचार केला, एकदा  ही खोलीही छान स्वच्छ करून तिची पुन्हा नव्यानं मांडणी करूयात. खोली आवरताना  मला प्रियंवदाच्या काही डायऱ्या सापडल्या. मला एव्हाना इतकं समजलं होतं की प्रियंवदानं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. प्रियांशु त्यावेळी एमएस करायला अमेरिकेला गेले होते. वडिलांनी परवानगी दिली नाही तेव्हा प्रियंवदा घरातून निघून गेली. तिनं लग्न केलं अन् मुलगी झाली तेव्हा मुलीला जन्म देतानाच तिचा मृत्यू झाला होता. तेव्हाच प्रियाशुनं प्रियाला आपल्याकडे आणलं होतं. मुलीचं पळून जाऊन लग्न करणं अन् त्यानंतर तिचा अकाली मृत्यू यामुळे बाबा इतके खचले की तेही पॅसिव्ह हार्ट अटॅकनं गेले. या पुढची माहिती मला प्रियंवदाच्या डायऱ्यांवरून मिळाली. एक डायरी प्रियाच्या जन्माची चाहूल लागल्यानंतची होती. प्रत्येक दिवसाची हकिगत त्या डायरीत नोंदलेली होती. शेखर म्हणजे प्रियंवदाचा नवरा. तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता. त्याला मुलगीच हवी होती. त्यानं तिच्यासाठी शिखा नावही ठरवलं होतं. प्रियंवदाला मुलगा हवा होता. तिनं   त्याच्यासाठी प्रियंक हे नाव ठरवलं होतं. त्याची ती प्रेमळ, खोटी खोटी भांडणं वाचून तर माझे डोळेच भरून आले. त्याचक्षणी माझ्या मनात आलं की बिचारा शेखर! त्याला त्याच्या मुलीची म्हणजे प्रियाची नक्कीच खूप खूप आठवण येत असणार. पण प्रियांशु किंवा आई, कधीच?शेखरचं नावही घेत नाहीत…का बरं? पण आपल्या लेकीला भेटण्याचा हक्क तर बाप या नात्यानं शेखरला आहेच. मी कायद्याचा अभ्यास करत होते, त्यामुळे हक्क वगैरे मला जास्तच कळत होते.

मी गुपचुप एक पत्र शेखरला टाकलं की तुम्हाला प्रियाला भेटायची इच्छा होत असेल तर तुम्ही केव्हाही येऊ शकता. शेवटी ती तुमची मुलगी आहे. आता मी शेखरची वाट बघत होते की ते जेव्हा येतील तेव्हा आई व प्रियांशुला कसा आश्चर्याचा धक्का बसेल अन् प्रियाला बघून शेखरला किती आनंद होईल.                                                       क्रमश:

विवाहाची रेशीमगाठ

कथा * अर्चना पाटील

रिया आणि आशिषचा विवाह खूपच थाटामाटात पार पडला होता. आशिष आपल्या बेडरूममध्ये उत्साहाने दाखल झाला, पण रियाची स्थिती पाहून आशिष काळजीत पडला. रिया खिडकीतून बाहेर पाहात होती, पण तिचे पाणावलेले डोळे आशिषच्या नजरेतून सुटले नाहीत. आशिषने विचारले, ‘‘तू या लग्नामुळे खूश नाहीस का? पाठवणी करून चार तास उलटले, तरीही तू रडतेस.’’ रियाने मान झुकवली. ‘‘असं काही नाहीए, सहजच डोळ्यात पाणी आले,’’ रियाने उत्तर दिले.

आशिषने रियाच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून तिला आश्वासित केले, ‘‘तू आजपासून अग्निहोत्री घराण्याची सून आहेस आणि माझी बायको आहेस. तू विचार करण्याआधीच तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील. जस्ट रिलॅक्स बेबी. आता शांतपणे झोप. उद्या बोलू.’’

दुसऱ्या दिवशी घरात पूजा होती. सर्वजण रियाच्या मागे-पुढे करत होते, पण रियाचं लक्ष दुसरीकडेच होतं. पूजेच्या वेळी तिला पुन्हा-पुन्हा हटकले जात होते. संपूर्ण दिवस ती अबोलच होती. आशिष तिच्या वागण्यामुळे काळजीत पडला होता. रात्रीच्या वेळी आशिष बेडरूममध्ये आला. रिया आरशासमोर बसली होती. आशिष तिच्या मागे उभा राहून तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला. आशिष रियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण रियाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. ‘‘काय प्रॉब्लेम आहे? मी तुझ्याशी बोलतोय आणि तू दुसराच विचार करतेस.’’ आशिष वरच्या आवाजात ओरडू लागला. रिया आशिषच्या अशा वागण्याने घाबरली आणि तशीच बसून राहिली. आशिष रात्री बारा वाजता पायीच बंगल्याबाहेर निघून गेला.

तिसऱ्या दिवशी रियाचा भाऊ आणि तिच्या माहेरहून एक नोकर संतोष रियाला भेटायला आले. संतोषने गुपचूप रियाला एक पाकीट बेडरूममध्ये जाऊन दिले. रियाने भाऊ सासरहून निघून जाताच पाकीट उघडले आणि अधीरपणे त्यात ठेवलेल्या तिच्या प्रियकर सारंगच्या चिठ्ठ्या वाचू लागली. रिया चिठ्ठ्या वाचत होती आणि बेडच्या खाली टाकत होती. इतक्यात आशिष खोलीत आला. आशिषने एक चिठ्ठी उचलली आणि वाचू लागला. आशिषच्या सर्व हकिकत लक्षात आली. आशिष केव्हा खोलीत आला, हे रियाला कळलेच नाही, पण आशिषला चिठ्ठी वाचताना पाहून ती घाबरली. आशिषने रागाने चार गोष्टी सुनावून रियाला घरातून निघून जायला सांगितले. रियाजवळ काहीही उत्तर नव्हते. रियाला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आशिषच्या भावनांशी खेळण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता. रियाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. आता पुढे काय होणार, या विचाराने ती घाबरली आणि रडू लागली. आता माहेरीही तिला कोणीही स्वीकारणार नाही ही गोष्ट रियाला माहीत होती.

रात्रीचे ९ वाजले होते. रिया आतुरतेने आशिषची वाट पाहात होती. तिला त्याची माफी मागायची इच्छा होती. खिडकीतून तिचे डोळे आशिषला शोधत होते. इतक्यात, एक गाडी बंगल्यासमोर उभी राहिली. आशिषचे मित्र त्याला घरात आणत होते. आशिषच्या एका हाताला फ्रॅक्चर होते आणि तो उभाही राहू शकत नव्हता. आशिषचे मित्र त्याला बेडरूममध्ये घेऊन आले. कुटुंबातील सर्व लोक खोलीत जमा झाले.

‘‘काय झालं माझ्या मुलाला? कोणीतरी सांगा, मला भीती वाटतेय,’’ रियाची सासू आशिषच्या मित्रांना विचारत होती.

‘‘काही नाही आई, बस्स एक छोटेसं अॅक्सिडंट झालंय. आपल्या मुलाचं नवीननवीन लग्न झालंय, होतं असं कधी-कधी बायकोच्या आठवणीने. आता या निमित्ताने या दोघांना सोबत राहता येईल. जे होतं ते चांगल्यासाठी होतं आई.’’

‘‘काय चांगल्यासाठी होतं, माझ्या मुलाचा हात मोडलाय. त्याच्या पायाला जखमा झाल्यात. रिया दुसरा शर्ट आण. किती रक्ताने माखलेय याचे शर्ट.’’

‘‘हो आई.’’

आशिषला तर रियाकडे पाहायचीही इच्छा नव्हती आणि रिया त्याच्या एका कटाक्षासाठी आसुसली होती.

‘‘चला चला, आता सर्व खाली चला. थोडेसे काम वहिनीलाही करू द्या.’’

सर्वजण बेडरूममधून बाहेर निघून गेले. रिया शर्ट घेऊन आली, पण आशिषने रागाने तोंड फिरवले.

‘‘अहो, माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माहीत आहे, मी माफी मागण्याच्या लायकीची नाहीए, पण प्लीज मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या. मला माफ करा, आता तुमच्याशिवाय मला या जगात कोणाचाही आधार नाहीए.’’

‘‘तू लग्नापूर्वीच सर्व गोष्टी सांगितल्या असत्यास, तर माझं आयुष्य बरबाद झालं नसतं ना.’’

‘‘काय बोलताय तुम्ही लोक? रिया, तू काही कामाची नाहीस. आण शर्ट इकडे. मलाच बदलावे लागेल. एक कप आले घातलेली चहा घेऊन ये माझ्या मुलासाठी.’’

दुसऱ्या दिवशी रिया पुन्हा शर्ट घेऊन आशिषच्या समोर उभी राहिली.

‘‘तुला माझ्या मागे-पुढे करण्याची काही गरज नाहीए.’’

‘‘लवकर शर्ट बदल, तुला पाहायला शेजारी आलेत,’’ आई आवाज देत होती.

‘‘घाला ना प्लीज.’’

रिया आशिषच्या जवळ जायला कचरत होती, पण आता तिला आपली चूक सुधारायची होती. एक पत्नी आणि सुनेचे कर्तव्य तिला मनापासून निभवायचे होते. शेजारी बेडरूममध्ये भेटायला आले. रिया सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली.

‘‘किती सुशील सून मिळाली आहे तुम्हाला अग्निहोत्री सर.’’

‘‘ते तर आहेच, रिया आमची सून नाही, मुलगी आहे.’’

रिया आता सर्वांसोबत छान मिळूनमिसळून राहायची. परंतु तरीही आशिष आणि तिच्यामधील दुरावा संपत नव्हता.

रात्रीचे दोन वाजले होते. घरातील सर्व लोक झोपले होते. आशिषला झोप येत नव्हती. रियाही बेडवर पहुडली होती. पण तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते. रिया आता आशिषचे शर्ट बदलणे, त्याला जेवण भरवणे, स्पंजने त्याला वॉश करणे ही सर्व कामे करत होती. परंतु आशिषकडून कोणतीही प्रेमाची पावती मिळत नव्हती. काही दिवसांतच आशिष बरा झाला. आशिषचा एक मित्र कोलकात्यात राहात होता. आशिषने त्याला सारंगला शोधायला सांगितले. सारंग रियाच्या समोरच्या घरात भाड्याने राहात होता. आपल्या बिझनेससाठी तो काही दिवस दिल्लीला आला होता. पण रिया पुन्हा-पुन्हा जेवण घेऊन त्याच्या घरी जात असे. रियाचे वडील रोज संध्याकाळी सारंगसोबत फिरायला जात असत. सारंगही काही ना काही बहाणा करून रियाच्या घरी येऊन बसत असे. सर्वकाही नीट चालले होते. एके दिवशी सारंगने रियाच्या वडिलांच्या फोनवर मेसेज पाठवून रियाला मागणी घातली होती. सारंगचा मेसेज वाचून रियाच्या वडिलांनी सर्वप्रथम त्याला कॉलनीच्या बाहेर काढले आणि मग आपल्या जीवनातून. सारंग दुसऱ्या जातीचा होता, पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो, तर मग जावई का नाही? ही गोष्ट रिया आणि सारंगला शेवटपर्यंत कळली नाही. सारंग लग्नाच्या दिवसापर्यंत त्याच शहरात तिची वाट पाहात राहिला आणि शेवटी कोलकात्याला परतला. एके दिवशी आशिषने नोकर संतोषला पकडले आणि ही सर्व माहिती मिळवली.

आशिषचे आईवडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला निघून गेले. सोबत घरातील नोकरांनाही घेऊन गेले. आता रिया आणि आशिषशिवाय घरात कोणीही नव्हते. तरीही आशिषने रियावर ती बायको असल्याचा हक्क गाजवला नाही आणि ना ही तिच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला. आशिषला रिया आवडत होती. परंतु रियाचा आनंद सारंगमध्ये होता.

‘‘तुम्ही नाश्ता करून गेलात तर बरं होईल. मी आईंसारखं काही बनवू शकत नाही, पण मी प्रयत्न केला आहे. तुम्ही मला नाराज करणार नाही, अशी अपेक्षा आहे.’’

‘‘जरूर.’’

‘‘रात्रीच्या जेवणासाठी मी तुमची वाट पाहीन,’’ रिया आशिषचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. नशिबाने त्यांना जवळ येण्याची खूप संधी दिली, पण आशिषने नेहमी रियाला स्वत:पासून दूर ठेवले. रियाने लग्न करून एक चूक केली होती, पण आशिषला आता दुसरी चूक करायची नव्हती. एका आठवड्यानंतर आशिष रियाला घेऊन कोलकात्याला पोहोचला. कोलकात्याचे नाव ऐकताच रिया गोंधळात पडली.  दोघंही एका हॉटेलमध्ये उतरले. आशिषने रियासाठी वेगळी खोली बुक केली.

रात्रीचे दोन वाजले होते. रियाला काही कळत नव्हते. रिया आशिषशी बोलताना नेहमी घाबरत असे. त्याच्याशी नजरानजर करायची हिंमतही तिच्यात नव्हती. रात्रीचे दोन वाजले होते. रियाला झोप येत नव्हती. तिने आशिषच्या खोलीचा दरवाजा वाजवला.

‘‘तू एवढ्या रात्री, झोपली नाहीस का अजून?’’

‘‘मी आत येऊ शकते का?’’

‘‘आपण कोलकात्याला का आलोय?’’

‘‘सारंगला भेटायला. तू सारंगसोबत जास्त खूश राहशील.’’

‘‘मला काय हवंय, याचा निर्णय तुम्ही कसा घेतलात? स्त्रियांचे निर्णय नेहमी पुरुषच का घेतात?’’

‘‘कारण स्त्री स्वत: आपल्या जीवनाचे निर्णय घेत नाही. तू सारंगसोबत पळून जायला हवं होतं किंवा लग्नानंतर त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं, पण यातील एकही निर्णय तू घेतला नाहीस. एखाद्या मुलीने घाबरत संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत काढावे, हे मला मान्य नाही. माहेरी तुला जायचे नाहीए. त्यामुळे मी तुला सारंगकडे पाठवत आहे.’’

‘‘मी तुम्हाला घाबरत नाहीए. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला, त्यामुळे मला स्वत:ची लाज वाटते. एखाद्या मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तिसोबत राहणे किती कठीण असते, जेव्हा त्याला ती आवडत नाही, हे तुम्हाला नाही कळणार. बहुतेक तुम्हाला माझ्यासारख्या उनाड मुलीसोबत आपले आयुष्य घालवायचे नाहीए, पण मला माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल. सारंगवर माझे प्रेम होते, पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा वागेल मला माहीत नाही. त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल, हेही मला माहीत नाही, पण अग्निहोत्री कुटुंबासारखे कुटुंब मला दुसरे कुठलेही मिळणार नाही.’’

‘‘तू पूर्ण शुध्दीत आहेस का?’’

‘‘हो,मी आज पहिल्यांदा माझ्या मनातील गोष्ट तुमच्याशी बोलतेय. जर मी तुमच्यासोबत राहिले, तर मला माझ्या माहेरचे प्रेमही मिळत राहील. नेहमी आपल्या इच्छेनुसारच सर्व आपल्या आयुष्यात घडावे हे आवश्यक नाही. माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात आपल्या हातात दिला आहे आणि ते कधी चुकीचे ठरू शकत नाहीत, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. सारंग केवळ माझ्या घरासमोर राहात होता, त्याची फॅमिली, बिझनेस, मित्र याबाबत मला काहीही माहिती नाही. मला  नाही ठाऊक की, मी त्याच्यामागे एवढी वेडी का झाले होते? लग्न करण्यासाठी मुलाचे घराणे, उत्पन्नाची साधने या गोष्टीही  महत्त्वाच्या असतात. तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टींनी माझे मन जिंकले आहे, त्यामुळे मला तुम्ही आवडू लागला आहात.’’

‘‘याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा दिल्लीला जावे लागेल.’’

‘‘हो नक्कीच, मला मिसेस अग्निहोत्री बनल्याचा पूर्ण अभिमान आहे.’’

केवढे क्रौर्य हे – भाग-2

(शेवटचा भाग)

कथा * पूनम अहमद

पूर्व कथा :

मुंबईतल्या मुस्लिम बहुल वस्तीतल्या शौकतअली अन् आयेशा बेगमला तीन मुली अन् एक मुलगा अशी चार अपत्यं होती. सना, रूबी, हिबा या तीन मुलींवर झालेला मुलगा हसन आईच्या अतोनात लाडामुळे बिघडलाच होता. आईला वाटे दर्ग्याजवळ बसणाऱ्या जमाल बाबामुळे हसनला धर्माच्या चार गोष्टी शिकता येतील. तंत्रमंत्र चमत्कार करून जमालबाबा लोकांची फसवणूक करत होता. पण भोळ्या लोकांना काहीच संशय येत नव्हता. हळूहळू हसन बदलत होता. स्वत:च्या सख्ख्या बहिणींकडे तो वाईट नजरेनं बघत होता. लग्न होऊन बहिणी सासरी गेल्या. शिक्षण पूर्ण होऊन हसनला नोकरी लागली. चांगली बायकोही मिळाली. आता त्याला नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी तो बहिणींकडे कर्ज म्हणून पैसे मागत होता. त्यांचे दागिने तरी त्यांनी द्यावे म्हणून त्यांच्यावर दबाव आणत होता.            – आता पुढे वाचा..

त्या रात्री सगळेच काळजीनं ग्रासले होते. झोपायला गेल्यावरही कुणाला झोप येईना. हिबानं बहिणीला विचारलं, ‘‘बाजी, कसला विचार करते आहेस? हसननं तर भलतंच संकटात टाकलंय आपल्याला. माझे दागिने मी त्याला कशी देऊ? सासूबाई, सासरे, नवरा सगळ्यांना विचारावं लागेल…त्यांना काय वाटेल? अन् न दिले तर हा काय करेल ते सांगता येत नाही…’’

‘‘तेच तर गं? काय करावं काही समजत नाहीए. आईचा चेहरा तर बघवत नाहीए. तिच्यासाठी तरी असं वाटतं की हसनला थोडी मदत करावी. अब्बूंनी जरी नाही म्हटलं तरी मी रशीदशी या बाबतीत बोलेन म्हणतेय.’’

दुसऱ्या दिवशी रशीद अन् जहांगीर आले तेव्हादेखील हसनचा मूड चांगला नव्हताच. त्या दोघांनी त्याला हसवायचा, बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण तो गुश्श्यातच होता. बहिणींनी त्यांना खूण करून गप्प बसायला संगितलं, मग त्यांनीही विषय फार ताणला नाही.

दोघी बहिणी आपापल्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी निघून गेल्या. शौकतनं हसनला बोलावून घेतलं अन् प्रेमानं म्हणाले, ‘‘बाळा, ही चूक करू नकोस, चांगली नोकरी मिळाली आहे. नियमित पैसा मिळतोय…बिझनेसचा ना तुला अनुभव आहे ना पैसा आहे…हे खूळ डोक्यातून काढून टाक.’’

हसन भांडण्याच्या पवित्र्यात बोलला, ‘‘माझा निर्णय झाला आहे. तुम्हा सर्वांनी मला मदत केलीच पाहिजे…नाहीतर…रागानं आई वडिलांकडे बघत तो निघून गेला.’’

मुलाचा हा अवतार बघून आयेशाला तर घेरीच आली.

marathi -katha

हसन आता ३५ वर्षांचा झाला होता. पूर्णपणे जमाल बाबाच्या आहारी गेला होता. त्याच्या शब्दासाठी तो वाट्टेल ते करायला तयार झाला असता. बाबाला खात्री होती, त्याच्या सर्व शिष्यांमध्ये सर्वात मूर्ख अन् हट्टी हसनच होता.

शौकतनं बजावून सांगितलं होतं तरीही आयेशानं हसनसाठी मुलींपुढे पदर पसरला.

सना रशीदशी बोलली. तो ही थोडा विचारात पडला. पण मग म्हणाला, ‘‘८-१० लाखांपर्यंत व्यवस्था करू शकेन. तसं खरं अवघडच आहे, पण शेवटी तुझा एकुलता एक भाऊ आहे. प्रेम करतो तुमच्यावर, घरी सगळ्यांना जेवायला बोलावतो. आम्हाला मान देतो. स्वत: स्वयंपाकघरात राबतो…अशा भावाला मदत करायलाच हवी. बोल त्याच्याशी…एवढीच रक्कम मला देता येईल अन् हे कर्ज असेल…’’

नवऱ्याच्या समजूतदारपणामुळे सना भारावली. अश्रू भरल्या डोळ्यांनी तिनं त्याला धन्यवाद दिले.

सनानं हिबाला फोन करून रशीदचा निर्णय सांगितला. त्यावर हिबा म्हणाली, ‘‘मी पण जहांगीरशी बोलले…कॅश तर आम्ही देऊ शकणार नाही, पण माझे दागिने देता येतील. जहांगीरही म्हणाले की इतकं प्रेम करणारा, वारंवार भेटायला, जेवायला बोलावणारा भाऊ आहे. त्याला त्याच्या अडचणीच्यावेळी मदत करायलाच हवी.’’

सना अन् हिबा एकत्रच माहेरी पोहोचल्या. शौकत अली कामावर गेले होते पण हसन घरीच होता. झोया, लहानग्या शान अन् आयेशा या दोघींना बघून आनंदले.

सनानं रशीद काय म्हणाला ते सांगितल्यावरच हसन आनंदला. ‘‘रशीद जिजाजी खूपच सज्जन अन् दयाळू आहेत. मी त्यांचे पैसे लवकरच परत करेन.’’ तो म्हणाला.

हिबानंही दागिन्यांचा डबा त्याच्या हातात दिला. त्यानं डबा उघडून दागिने बघितले. ‘‘खूप मदत झाली. हिबा बाजी, तुझेही दागिने मी ठेवून घेणार नाही. लवकर परत देईन.’’ मग आयेशाकडे वळून म्हणाला, ‘‘अम्मी, मी आता बिझनेसच्या तयारीला लागणार. मी विचार करतोय. झोयाला तीन चार महिन्यांसाठी माहेरी पाठवून द्यावं.’’

झोयाला पुन्हा दिवस गेले होते. यापूर्वी तिला माहेरी पाठवण्याबद्दल हसन तिच्याशी काहीच बोलला नव्हता. ती चकित झाली. ‘‘तुम्ही इतका अचानक असा सगळा कार्यक्रम ठरवलात…मला निदान विचारायचं तरी?’’

‘‘त्यात तुला काय विचारायचं? आईकडे जा. थोडी विश्रांती मिळेल तुला. मीही आता फार कामात असेन. बाळंतपणानंतर मी तुला घ्यायला येईन ना?’’

झोयानं सासूकडे बघितलं, ‘‘खरंच जा झोया. इथं तुला विश्रांती मिळत नाही. काही महिने आराम मिळायला हवाच आहे तुला….’’ आयेशानं म्हटलं.

झोयानं होकारार्थी मान डोलावली. पण मनातून तिला वाटलंच की असा कसा शौहर आहे, मला आईकडे जायचं, किती दिवस राहायचं हे सगळं मला न विचारता, परस्पर कसं ठरवतो हा?

दोन दिवसांनी हसननं झोयाला माहेरी नेऊन सोडलं. आता तो घरात फारसा नसायचा. कधीतरी यायचा, कधीही जायचा. बाबाकडे जाऊन बसायचा. इकडे तिकडे भटकायचा. बहिणींनी दागिने व पैशांची मदत केलीय हे त्यानं बाबाला सांगितलं.

बाबा म्हणाला, ‘‘मला तुझ्यासाठी खूप काही करायचं आहे. तू इथून थोड्या अंतरावर एक खोली भाड्यानं घे. तिथं मी माझ्या मंत्रतंत्राच्या शक्तिनं तुझं भविष्य चांगलं घडवण्यासाठी बरंच काही करू शकतो. इथं सतत लोक येत असतात. त्यांच्या समक्ष मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. अल्लातालानं मला दिलेल्या विशेष शक्तीचा वापर मी तुझ्यासारख्या खुदाच्या नेक धंद्यासाठी करू शकतो.’’

‘‘ते ठिक आहे. पण मी बहिणींचा सर्व पैसा त्यांना परत कसा करणार? तुम्ही सांगितल्यामुळे मी नोकरीही सोडलीय. आता मी काम काय करू?’’

‘‘सध्या तरी बहिणींच्या पैशानं स्वत:चे खर्च चालू ठेव. मी माझ्या शक्ती वापरून लवकरच तुला खूप श्रीमंत करून टाकतो.’’

हसननं बाबाच्या दर्ग्यापासून काही अंतरावर एक वनरूम किचन फ्लट भाड्यानं घेतला. बाबा एकदम खुश झाला. बाबा खुश झाला म्हणून हसनही आनंदला की त्यानं बाबांच्या मर्जीचं काम केलंय. आता बाबा सांगेल तसं काही सामानही तो त्या घरात नेऊन ठेवत होता.

शौकत अलींनी बराच विचार केला. त्यांनाही वाटलं की मुलगा धंद्यासाठी पैसा उभा करण्यासाठी बराच धडपड करतोय. त्यांनी हसनला जवळ बोलावून विचारलं, ‘‘हसन, तू काय काम करायचं ठरवलं आहेस?’’

‘‘अजून काहीच ठरवलं नाहीए अब्बू. जमाल बाबा म्हणतात की मी धंद्यात खूप यश व पैसा मिळवेन. तेवढ्यासाठी मी नोकरीही सोडलीय.’’

अजून शौकत अलींना याची कल्पनाचा नव्हती. त्यांना धक्का बसला, रागही आला. पण राग आवरून त्यांनी हसनला त्यांची काही जमीन होती, त्यातील अर्धा भाग विकून पैसा उभा करता येईल असं सांगितलं.

हसनला वडिलांकडून इतक्या मोठ्या मदतीची अपेक्षा नव्हती. अन् वडिलांकडे अशी प्रापर्टी आहे हे ही त्याच्या लक्षात नव्हतं.

जमिनीची किंमत खूपच आली. बाबाकडे जाऊन हसननं त्याला ही बातमी दिली. बाबा मनातून आनंदला पण वरकरणी उदास अन् गप्प बसून राहिला. हसननं कारण विचारल्यावर म्हणाला, ‘‘माझ्या गावातली एक निराधार विधवा माझ्याकडे मदत मागायला आलीय. तिला घरच्यांनी हाकलून दिलंय. मी हा असा फकीर. तिला मी काय मदत करणार? आता तिला माझ्या झोपडीत आश्रय दिलाय. पण मी तिला रात्री तिथे ठेवू शकणार नाही.’’

बाबानं कमालीच्या दु:खी आवाजात म्हटलं, ‘‘तुझ्या पाहण्यात तिला राहता येईल अशी एखादी जागा आहे का?’’

‘‘बाबा, तुम्ही तंत्रमंत्र करण्यासाठी जी जागा घ्यायला लावलीत, तिच माझ्याकडे आहे…पण तिथं एकांत हवा आहे तेव्हा…’’

‘‘हरकत नाही, काही दिवसांची सोय झाली. मी लवकरच तिची काहीतरी व्यवस्था करतो. पण सध्या तुझ्या खोलीची किल्ली मला दे अन् हो, त्या विधवेबरोबर तिची तरूण मुलगीही आहे…’’

हसननं खोली घेतल्याचं घरातल्या कुणालाही माहिती नव्हती. हसननं खोलीची किल्ली बाबाला दिली. बाबाला त्याच्या मूर्ख शिरोमणी शिष्याकडून हीच अपेक्षा होती. ती विधवा म्हणजे बाबाची रखेलच होती. तिच्या चारित्र्यहीनतेमुळेच सासरच्यांनी तिला घराबाहेर काढली होती. तिची तरूण मुलगीही आईप्रमाणेच चवचाल होती. तिचं नाव अफशा. आईचं नावं सायरा. बाबानं दोघी मायलेकींची हसनशी ओळख करून दिली. तरूण अन् सुंदर अफशाला बघताच हसन तिच्यावर भाळला. दोघी मायलेकींच्या ते बरोबर लक्षात आलं.

बाबा संधी मिळेल तेव्हा सायराच्या संगतीतवेळ घालवत होता. अफशानं हसनला बरोबर जाळ्यात ओढलं होतं. एका पोराचा बाप, दुसरं मुल होऊ घातलेलं, झोयासारखी सर्वगुण संपन्न पत्नी असूनही हसन अफशाच्या नादी लागला होता. तिला भरपूर पैसे देत होता. तिच्यावर हवा तसा पैसा उधळत होता. घरी कुणालाही याबद्दल काहीही माहीत नव्हतं.

एक दिवस सना दुपारची माहेरी आली होती. त्यावेळी काही सामान घेण्यासाठी तिची अम्मी बाजारात गेली होती. अब्बू कामावरून सायंकाळीच परतायचे. सनानं रूबीला जवळ घेऊन तिचे लाड केले. हसन त्याचवेळी बाहेरून आला. निकहत जी रूबीला सांभाळायची, ती चहा करायला आत गेली. हसनला बघताच रूबीनं सनाचा हात घट्ट धरला अन् ती घशातून विचित्र आवाज काढायला लागलीय. तिला बोलता येत नसे. तिनं सनाला घट्ट मिठी मारली अन् ती रडू लागली.

हसननं बहिणीला दुआसलाम करून रूबीकडे रागानं बघितलं अन् वरच्या आपल्या खोलीत निघून गेला.

रूबीच्या डोक्यावरून हात फिरवत सनानं विचारलं, ‘‘काय झालं रूबी?’’

हसनच्या खोलीकडे बघंत रूबीनं काही खुणा केल्या. सनानं घाबरून विचारलं, ‘‘हसन काही म्हणाला?’’

रूबीनं होकारार्थी मान हलवून आपल्या शरीरावर काही ठिकाणी खुणा करून जे सांगितलं ते सनाला बरोबर कळलं. संतापानं ती थरथरायला लागली.

आपल्या अपंग मतीमंद बहिणीवर हसननं बलात्कार केला होता.. तिनं ताबडतोब हिबाला फोन करून सगळं सांगितलं अन् लगेचच निघून यायला सांगितलं.

आयेशा अन् हिबानं एकाचवेळी घरात प्रवेश केला. हिबाचा रागानं लाल झालेला चेहरा अन् एकूणच देहबोली बघून दारातच आयेशानं विचारलं, ‘‘काय झालं? इतकी संतापलेली का आहेस?’’

तिनं बाजार करून आणलेल्या पिशव्या हिबानं उचलून आत नेऊन ठेवल्या अन् म्हटलं, ‘‘तुमच्या खोलीत चल, बाजी पण आलीय.’’

आयेशा खोलीत पोहोचली. सनाचा चेहरा बघूनच तिच्या लक्षात आलं प्रकरण गंभीर आहे. ‘‘काय झालं सना? तुम्ही दोघी इतक्या रागात का?’’

सनाचा आवाज संतापानं चिरकत होता. ‘‘लाज वाटतेय हसनला आमचा भाऊ म्हणताना…अम्मी तुला कल्पना आहे त्यांनं काय केलंय याची?’’

घाबरून आयेशानं विचारलं, ‘‘काय…काय केलंय त्यानं?’’

‘‘त्यानं आपल्या असहाय, विकलांग बहिणीवर बलात्कार केलाय. बोलता बोलता सनाला रडू फुटलं.’’

आयेशाला हे ऐकून इतका धक्का बसला की एखाद्या दगडी मूर्तीसारखी ताठर झाली. तेवढ्यात बाहेर सनाला काहीतरी चाहूल लागली. तिनं बघितलं तर हसन जाताना दिसला. त्यानं सगळं बोलणं ऐकलं होतं.

स्वत:चं कपाळ बडवून घेत आयेशा म्हणाली, ‘‘स्वत:च्या पोरीची काळजी मला घेता आली नाही यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही.’’

सायंकाळी शौकत अली घरी आले, तेव्हा त्यांना हसनचं घृणास्पद कृत्य सांगण्यात आलं. संतापानं ते पेटून उठले. ‘‘आत्ताच्या आत्ता त्याला घराबाहेर काढतो,’’ ते गरजले. मग मुलींना धीर देत म्हणाले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. त्याला शिक्षा नक्कीच होईल.’’ दोघी मुली आपापल्या घरी निघून गेल्या.

निकहत घरात असायची अन् घरातली बरीच कामंही करायची. रूबी झोपलेली असेल तेवढ्या वेळातच ती कामं आटोपायची व उरलेला सर्व वेळ रूबीसोबत असायची. पण आयेशा जेव्हा बाहेर जायची, तेव्हाच काहीतरी काम काढून हसन निकहतलाही बाहेर पाठवून द्यायचा अन रूबीवर बलात्कार करायचा. चाकूचा धाक दाखवून तिला गप्प बसायला सांगायचा. तिचं घाबरलेपण अन् एकूण स्थिती बघूनही आयेशाला वाटायचं की तिच्या मानसिक अस्वस्थतेमुळे ती अशी वागते. हसनच्या अशा वागण्याची तर स्वप्नातही तिने कल्पना केली नव्हती. त्यातून आयेशा कायम हसनच्या कौतुकात अन् सरबराईत असल्यामुळे रूबी दोघी बहिणींशीच रूळलेली होती. आईला ती आपली कुंचबणा, भीती, त्रास सांगू शकली नव्हती.

रात्री कुणीच जेवलं नाही. रूबीला औषधं देऊन झोपवलं होतं. हसन घरी आल्यावर शौकत त्याच्यावर ओरडले, ‘‘या क्षणी घरातून निघून जा.’’

‘‘का म्हणून? हे घर माझंही आहे.’’ तो निर्लज्जपणे म्हणाला. ‘‘मला या घरातून कुणीही काढू शकत नाही, समजलं का?’’

आयेशानं त्याच्या थोबाडीत मारली. ‘‘हसन या क्षणी निघून जा. निर्लज्ज कुठला…वडिलांशी इतक्या गुर्मीत उलटून बोलतो आहेस…’’

‘‘मी पुन्हा सर्वांना एक दिवस मारून टाकेन,’’ खिशातून चाकू काढून तो खुनशीपणानं बोलला, ‘‘तुम्हा सर्वांचा तिरस्कार वाटतो मला.’’

शौकत अन् आयेशा मुलाचं हे रूप बघून चकित झाले. मनातून घाबरलेही.

हसननं सुरा दाखवत पुन्हा म्हटलं, ‘‘पुन्हा सांगतो, तुमची सगळी संपत्ती फक्त माझी आहे. त्यावर फक्त माझा हक्क आहे.’’ रागानं अम्मी अब्बूकडे बघून तो आपल्या खोलीत निघून गेला व धाडकन् दार लावून घेतलं.

हसनचा बराच वेळ आता अफशाबरोबरच जायचा. भरपूर पैसे हातात होते. बाबा त्याच्याकडून मंत्रतंत्रसाठी मोठमोठ्या रकमा मागून घ्यायचा. आपण लवकरच मालामाल होऊ या आशेवर असलेला हसन बाबावर पूर्णपणे विसंबून होता.

झोयाला मुलगी झाली. सगळ्यांना आनंद झाला. पण हसनशी कुणीच बोलत नव्हतं. आयेशा तेवढी थोडंफार बोलायची.

सना अन् हिबा तर भावावर खूपच नाराज होत्या. स्वत:च्या नवऱ्यालाही त्या याबद्दल सांगू शकत नव्हत्या. त्यांनी आपला पैसा व दागिने परत मागून घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे दोघी एकदा ठरवून हसन घरी असेल अशा वेळी आल्या.

दोघींनीही प्रथम त्याला भरपूर रागावून घेतलं अन् सरळ आपलं पैसे व दागिने परत करण्यास परखडपणे सांगितलं.

हसनला वाटलं होतं की ओरडतील, रागावतील अन् निघून जातील. पण त्या पैसे व दागिने परत मागतील असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. पण यावेळी त्यानं एकदम नमतं घेतलं. ‘‘मला क्षमा करा..माझं फारच फार चुकलंय. मला लाज वाटतेय स्वत:चीच… मला माफ करा.’’

‘‘नाही हसन, या गुन्ह्याला क्षमा नाहीए.’’

‘‘मी उद्या झोयाला घ्यायला जातोय. तुमचे पैसे मी अगदी लवकरात लवकर परत करतो.’’

झोया सर्वांची लाडकी होती. त्यातून ती बाळंतीण, तान्ह्या लेकीला घेऊन येईल, तेव्हा आपोआपच सगळ्यांचा राग निवळेल ही हसनची अटकळ खरी ठरली. त्याच्या कृष्णकृत्याबद्दल झोयाला कुणीच काही सांगणार नाही याची त्याला खात्री होती.

दुसऱ्याच दिवशी तो झोयाला घेऊन आला. लहानगी माहिरा व शान आल्यानं घरातलं तणावाचं वातावरण थोडं निवळलं. झोयाला काही कळू नये म्हणून सगळेच जपत होते. तरीही झोयाला काही तरी शंका आलीच…‘‘मी गेल्यानंतर घरात काही घडलंय का?’’ तिनं हसनला विचारलं, ‘‘सगळे गप्प का असतात?’’

‘‘काही नाही गं! मी जरा धंद्याच्या कामात गुंतलो होतो. अम्मी अब्बूशी बोलायला वेळ नसायचा. त्यामुळे ती दोघं नाराज आहेत. आता तू अन् मुलं आला आहात तर सगळं छान होईल. तू दोघी बाजींना फोन करून जेवणाचं आमंत्रण दे. खूपच दिवस झालेत. बाजी अन् मुलं आली नाहीएत.’’

झोयानं हसून होकार दिला.

हसन तिथून निघाला तो सरळ जमालबाबाकडे आला. ‘‘बहिणींनी पैसे परत मागितले आहेत. त्या फार नाराज आहेत.’’ त्यानं सांगितलं. बाबा जरा दचकला अन् मग त्यानं बऱ्याच उलटसुलट गोष्टी सांगून हसनचा ब्रेनवॉश केला. अल्ला, खुदा, मजहब वगैरेबद्दल बोलून तू खुदाचा बंदा आहेस, मोठं काम तुला करायचं आहे. जन्नतमध्ये तू जाशीलच. तुझ्या घरच्यांनाही जन्नत मिळेल.

अफशासारख्या दुर्देवी मुलीशी निकाह करून तू तिची जिंदगी सावर…एक ना दोन..बाबाच्या बोलण्यानं हसन खूपच भारावला. आता तो नेहमीचा हसन नव्हता. पार बदलला होता तो. खुदाचा खास बंदा जो सगळ्यांना जन्नत दाखवणार होता. सैतानच जणू त्याच्या शरीरात येऊन दडला होता.

झोयानं फोन केल्यामुळे शनिवारी दोघी बहिणी मुलांसह आल्या. हसनशी त्या बोलल्या नाहीत. पण झोया, शान व लहानग्या माहिराला बघून खूप आनंदल्या. माहिरासाठी आणलेली खेळणी, कपडे वगैरे त्यांनी झोयाला दिले.

हसन नेहमीप्रमाणे झेयाला स्वयंपाकात मदत करत होता. त्यामुळे बहिणीभावांमधला अबोला झोयाला कळला नाही.

रात्री सगळी एकत्र जेवायला हसली. हसन त्यावेळी मुलांना जेवायला वाढत होता. झोया मोठ्या मंडळींची काळजी घेत होती. झोयानं छान चविष्ट स्वयंपाक केला होता.

शौकत अन् आयेशालाही सगळी एकत्र आल्यानं बरं वाटलं होतं. झोयाकडे बघून सगळी गप्प होती. हसनबद्दल कुणाचंच मत चागलं नव्हतं. दहा वाजेपर्यंत जेवणं आटोपली. दोघी बहिणींनी झोयाला सगळं आवरायला मदत केली. हसन मुलांमध्येच खेळत होता. मुलं खूप धमाल करत होती.

हसननं झोयाला म्हटलं, ‘‘मी सगळ्यांसाठी सरबत करून आणतो,’’ झोयानं प्रेमानं हसनकडे बघून हसून मान डोलावली.

हसननं सरबत तयार केलं. सावधपणे पॅन्टच्या खिशातून एक पुडी काढली अन् बाबानं दिलेली एक पावडर त्या सरबतात मिसळली. व्यवस्थित ग्लास भरून प्रथम मुलांना अन् मग मोठ्यांना सरबत दिलं.

त्यानं स्वत: नाही घेतलं, तेव्हा झोयानं विचारलं, ‘‘तुम्ही नाही का घेतलं सरबत?’’

‘‘नंतर घेतो. आत्ता नको वाटतंय.’’

सगळ्यांचं सरबत घेऊन झाल्यावर त्यानं ग्लासेसही उचलून नेले. अर्ध्या तासातच सगळ्यांना झोपेनं घेरलं. जिथं जागा मिळेल तिथं लोक आडवे झाले. शौकत, रूबी, सनाची तीन मुलं, हिबा अन् तिची तीन मुलं हॉलमध्येच झोपी गेली. शानही तिथंच झोपला होता.

हसननं आधी घराचं मेन गेट अन् नंतर सर्व खिडक्या व दारं आतून लावून घेतली. नंतर अत्यंत थंडपणे त्यानं एका धारदार चाकूनं प्रथम शौकत, मग हिबा, रूबी, हिबाची तीन मुलं, सनाची तीन मुलं, स्वत:चा मुलगा शान अशा सर्वांची गळ्याची शीर कापून खून केला. त्याच्यात सैतान पूर्णपणे भिनला होता. आपण काय करतोय ते त्याला कळत नव्हतं. तरीही तो अजिबात न डगमगता वर गेला.

प्रथम त्यानं झोया अन् नंतर तान्ह्या माहिराला गळ्याची शीर कापून मारलं. सनाच्या गळ्याची शीर कापताना सनाला शुद्ध आली. दुखल्यामुळे ती जोरात किंचाळली. बाकी लोकांचे प्राण गेले होते. सनाचा जीव गेला नव्हता. ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या किंचाळण्यामुळे आयेशालाही जाग आली. झोया अन् माहिराला रक्ताच्या थारोळ्यात बघून ती किंचाळली, ‘‘काय केलंस हसन?’’

‘‘अजून काम संपलं नाहीए माझं. तू अन् तुझा लेक जिवंत आहात अजून.’’

‘‘अरे बाळा, मला मारू नकोस,’’ हात जोडून आयेशानं प्राणाची भीक मागितली.

‘‘मी कुणालाही सोडणार नाही, सगळे लोक मेले आहेत. तू ही मर. खरं तर आता तुम्ही हे घाणेरडं जग सोडून स्वर्गात जाल. मी तुम्हाला तिथंच भेटेन.’’ हसननं वेळ न घालवता आयेशालाही मारून टाकलं.

एव्हाना सना खाली धावली होती. रक्तानं माखली होती, तरीही तिनं कसाबसा किचनचा दरवाजा गाठला अन् आतून बंद करणार तेवढ्यात हसननं तिच्या पोटात सुरा खुपसला. तरीही तिनं त्याला धक्का देऊन दरवाजा बंद केला. ती जोरजोरात ओरडत होती. एक ग्लास घेऊन ग्रीलवर जोरात आवाज करत होती.

त्या आवाजानं शेजारी जागे झाले. त्यांनी दुसऱ्या शेजाऱ्याला उठवलं सगळे धावत किचनकडे आले. ‘‘हसननं सगळ्यांना मारून टाकलंय.’’ सनानं म्हटलं. तिघा चौघांनी ग्रिल तोडून सनाला बाहेर काढलं. रात्रीच्या शांततेत आवाजानं लोक गोळा होत गेले. कुणी तरी पोलिसांना फोन केला. तिच्या हातातच सनानं प्राण सोडला. हसन आतून सगळं ऐकत होता.

खरं तर सगळ्यांना मारून तो अफशाबरोबर पळून जाणार होता. पण सनामुळे त्याचा बेत फसला होता. पोलिसांची गाडी आली होती. काही पोलीसांनी त्या ग्रिलमधून सनाला बाहेर काढलं होतं. तिथून आत गेले. असं दृश्य त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. सगळीकडे प्रेतंच प्रेत. रक्ताची थारोळी खाली अन् वरही. अन् आईच्या ओढणीने गळफास घेऊन लटकत असलेला हसन.

त्याला खाली काढलं पण प्राण गेलेला होता. लहानपणापासून मुलगा म्हणून फाजिल लाड झाले होते. धार्मिक अंधश्रद्धांनी डोकं भडकावलं होतं. पैशाचा मोह, झटपट श्रीमंत होण्याची लालसा या सगळ्यामुळेच ही परिस्थिती झाली होती.

खूप गर्दी जमली होती. दर्ग्यातून जमाल बाबाही आला होता. परिस्थितीचा अंदाज येताच त्यानं मागच्या मागे पोबारा केला.

केवढे क्रौर्य हे

(पहिला भाग)

कथा * पूनम अहमद

सगळ्या खोलीत रक्ताचा सडा पडलेला अन् रक्तात लडबडलेले मृतदेह…मुलं, मोठी माणसं, स्त्रिया सगळेच आपल्या माणसांकडून मारले गेले होते. वर जाणाऱ्या जिन्यावर रक्तात भिजलेल्या बुटाचे ठसे होते. एवढे कठोर हृदयाचे पोलीस…पण समोरचं दृश्य पाहून तेही हादरले. वर ही प्रेतं अन् आईच्या ओढणीने गळफास घेतलेला हसन.

मुंबईच्या ठाणे भागातल्या या मुस्लिमबहुल वस्तीत, कासारवडावलीत लहानलहान बोळ्यांच्या दुतर्फा दुकानं होती. अधूनमधून लोकांची घरं होती. कुणाची दुमजली, कुणी तिमजली घराचा मालक. एकूण वातावरण जुनाट अन्  मुस्लिम वस्तीत असतं तसंच. स्त्रिया मुली बुरखा घालूनच बाहेर पडायच्या. लोक आर्थिकदृष्ट्या सधन होते पण राहाणी अन् विचारसरणी जुनीच होती. मुलींना फारसं शिकवत नसत. त्यांची लग्न लवकर केली जात. मुलं मात्र शिक्षण पूर्ण करून बऱ्यापैकी नोकरी करत होती.

शौकत अली अन् आयेशा बेगमना तीन मुली होत्या. सना, रूबी अन् हिबा. तिघींमध्ये दोन दोन वर्षांचं अंतर होतं. धाकटा हसन हिबाहून पाच वर्षं लहान होता. आयेशाला तर लेकाला कुठे ठेवू अन् कुठे नको असं व्हायचं. तो वंशाचा दिवा म्हणून त्याचे लाडच लाड व्हायचे. हसनची काळजी एखाद्या राजपुत्राप्रमाणे घेतली जायची.

रूबी थोडी विकलांग मतिमंद अशी होती. तिला शाळेत घातलीच नव्हती. पण सना अन् हिबाला दहावीपर्यंत शिकवून त्यांची शाळा बंद केली होती. वडिलांची म्हणजे शौकत अलींची इच्छा होती, मुलींना पुढे शिकवावं पण आईने सक्त विरोध केला. ‘‘त्यांची लग्नं करण्याचं बघा, पैसा हसनच्या शिक्षणावर खर्च करायचा. हसन म्हणजे म्हातारपणीची काठी आहे. त्याची काळजी घ्यायला हवी,’’ या फाजील लाडामुळे खरं तर हसन बिघडला होता. शौकत एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करत होते. कुटुंबाचा खर्च अगदी आरामात भागेल एवढं त्यांना उत्पन्न होतंच. रूबीला उपचारांमुळेही फारसा फायदा झाला नव्हता. मुळात तिला बोलता येत नसे. उठणं, बसणं, चालणं, झोपणं या क्रियाही करताना मदत लागायची. खुणा करून ती थोडंफार सांगू शकायची. पण एकंदरीतच तिची परिस्थिती अवघड होती. हसन तिला फार त्रास देत असे.

जसजसा हसन मोठा होत होता त्याचं वागणं बिघडत होतं. पण त्याला कुणी काही म्हटलेलं आयेशाला खपत नव्हते. ती पटकन् त्याला पाठीशी घालायची.inside-pic

घराच्या जवळच एक दर्गा होता. तिथे एका कोपऱ्यात एक बाबा दिवसभर बसून असायचा. तो झाडफूंक करतो, भूतं उतरवतो, त्याला सिद्धा प्राप्त आहे असं लोकांना माहीत होतं. त्याच्याकडे दु:खावरचा उतारा घ्यायला खूप लोकांची गर्दी असायची. हसनला कधी बरं वाटत नसलं तर आयेशा त्याला पटकन् बाबाकडे न्यायची. तिचा त्याच्यावर फार विश्वास होता.

एकदा तिने बाबाला म्हटलं, ‘‘बाबा, हसनला काही धर्माच्या चार गोष्टी सांगा. तुमच्या पायाशी बसून त्याला जर धर्माबद्दल ज्ञान मिळालं तर त्याच्यासोबत आमचंही भलं होईल. मी रोज पाठवते त्याला तुमच्याकडे.’’

हसन आता बाबाकडे यायचा. त्याचे मित्र कमी झाले होते. बाबा काय सांगायचा कुणास ठाऊक, पण हसन थोडा शांत झाला होता. त्याच्या मनात कुठल्या विषवृक्षाची बिया पेरल्या जाताहेत याची अजिबात कल्पना नसलेली आयेशा मात्र आनंदात होती.

शौकतमियांना जेव्हा कळलं की हसन त्या बाबाकडे जातो तेव्हा ते भडकले, ‘‘तिथे बसून वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यास कर, वेळ सत्कारणी लागेल,’’ त्यांनी हसनला म्हटलं.

आयेशा उसळून म्हणाली, ‘‘असे कसे काय आहात हो तुम्ही? अभ्यासासोबत तुमचा मुलगा धर्माबद्दलही जाणून घेतोए, धर्माच्या मार्गाने जातोए म्हणताना तुम्हाला आनंद व्हायला हवा. बिचारे ते बाबा…चांगल्या गोष्टीच सांगता ना?’’

शौकत गप्पच झाले. सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांच्याही मनात मजहब, धर्म याविषयी अनामिक भीती होती.

काही वर्षं उलटली. सनासाठी स्थळं येऊ लागली. आयेशाने लेकाला म्हटलं, ‘‘आता सनाच्या लग्नाचं बघायला हवं.’’

तो ताडकन् उत्तरला, ‘‘अम्मी, तुझ्या मुलीच्या लग्नाशी माझा काहीही संबंध नाही. अब्बूच्या त्या लाडक्या आहेत, त्यांनी बघून घ्यावं. मला इतरही कामं आहेत.’’

शौकतना हे ऐकून धक्काच बसला. हताश होऊन ते उद्गारले, ‘‘शाब्बास बेटा, हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून…आयेशा, ऐकलंस ना?’’

आयेशाचाही आपल्या कानांवर विश्वास बसेना, ‘‘हसन? अरे तुझ्या बहिणी आहेत, तुला किती प्रेमाने सांभाळलंय त्यांनी…किती माया करतात तुझ्यावर?’’

‘‘तर मी काय करू? त्यांनी करायला हवं होतं. अन् हे बघ. या असल्या फालतू गोष्टी माझ्याशी बोलायच्या नाहीत. मी काही तरी वेगळं, मोठं काम करण्यासाठी जन्म घेतलाए. अशा बारीकसारीक गोष्टींमध्ये मला अडकवू नकोस.’’ रागारागांत आरडाओरडा करून पाय आपटत तो निघून गेला.

पहिल्यांदाच आयेशाचा चेहरा फटफटीत पांढरा झाला होता. मुलगा इतकं काही बोलेल, असे वागेल याची तिला कल्पनाचा नव्हती. ‘‘तुझ्या अति लाडानंच तो बिघडला आहे, अजूनही लक्ष दे,’’ शौकतने तिची समजूत काढली.

काही तरी चुकलंय हे कळलं तरी काय चुकलंय हे आयेशाला समजलं नाही. काय करावं हेही समजेना.

भिवंडीहून सनासाठी रशीदचं स्थळ आलं. तो बँकेत नोकरीला होता, समजतूदार, सुसंस्कृत, शांतवृत्तीचा रशीद शौकतना आवडला. त्याच्या घरीही सना सर्वांना पसंत पडली.

लग्नाची तारीख ठरली. एवढ्यात हसनचं वागणं बदलल्याची जाणीव सनाला झाली. एकदा दुपारी ती थोडी विश्रांती घेत आडवी झाली होती. हसन येऊन तिला चिकटून झोपला. तिने चमकून विचारलं, ‘‘काय रे, काय झालं?’’

‘‘काही नाही, माझ्या ताईजवळ झोपू शकत नाही का?’’ सना हसली. बहीण सासरी जाणार म्हणून बहुधा त्याला प्रेम वाटायला लागलं, तिच्या मनांत आलं.

हसनने मग तिच्या अंगावरून हात फिरवत काही बाही बोलायला सुरूवात केली. सना पटकन् उठून बसली. तिला काही तरी विचित्र जाणवलं. मनात आलं हसनला एक थोबाडीत द्यावी, वयात येण्याच्या काळातच मुलींना वेगळे स्पर्श कळायला लागतात. पण ती त्या क्षणी गप्प राहिली. तिथून उठून जायला निघाली.

‘‘बाजी, कुठे जातेस, थांब ना…’’ हसन म्हणाला. तशी ती म्हणाली, ‘‘नाही, अम्मीने काही कामं सांगितली होती. मला कामं आटपायला हवीत,’’ त्याच्या डोळ्यात तिला खटकणारं असं काही जाणवत होतं. नंतरच्या काळातही हसनचं येऊन मिठी मारणं, चिकटणं, इथे तिथे स्पर्श करणं तिला फार खटकत होतं, कडेखांद्यावर खेळवलेल्या धाकट्या भावाविषयी आपल्या मनात असं येतंय, याचाही तिला त्रास व्हायचा.

आयेशा म्हणायची, ‘‘बस, भाऊ आहे तुझा, त्याला प्रेम वाटतंय तुझ्याविषयी.’’

मधली रूबी मतिमंद विकलांग होती त्यामुळे हिबा अन् सनामध्ये अधिक जवळीक होती. हिबालाही हसनच्या अशा वागणुकीचा प्रत्यय आला होता पण तीही तोंड मिटून गप्प होती. दोघी मिळून मधलीला जपायच्या. आई सतत हसनमध्ये गुंतल्यामुळे मुलींच्या वाट्याला उपेक्षाच आली होती. दोघी बहिणींनी शेवटी विचारांती निर्णय घेतला की हे सांगायला हवं.

आयेशाचा विश्वास बसेना. पण मग तिच्याही ते लक्षात आलं. घरात लग्नाची गडबड होती. उगीच कुणाला काही कळून गोंधळ व्हायला नको म्हणून सगळं दाबून टाकायचं ठरवलं. पण आयेशा सतत हसनच्या मागावर राहायची. तो आईवर चिडायचा, ओरडायचा पण आयेशाने मुलींना त्याच्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं.

घराबाहेर हसन शांत अन् सभ्य मुलगा होता. पण घरात मात्र वाह्यात अन् बिघडलेलाच होता. सनाचं लग्न छान झालं. ती सासरी गेली अन् हीबा एकटी पडली.

कॉलेजच्या वेळाव्यतिरिक्त हसन जमाल बाबाजवळच बसायचा. धर्माच्या लंब्याचौड्या गप्पा करायचा. बाहेर लोकांना वाटायचं किती शांत, अमनपसंद, मजहबी मुलगा आहे, खरं काय ते घरातल्यांना ठाऊक होतं.

सनाच्या प्रयत्नांनीच हीबाचं लग्न जहांगीरशी झालं. तोही फार चांगला होता. सासची माणसंही छान होती. दोघी मुली चांगल्या घरी पडल्यामुळे शौकत अन् आयेशा फार समाधानी होती.

सनाने रूबीसाठीही एक चांगला पर्याय शोधला होता. माहितीतली एक घटस्फोटित स्त्री तिने दिवसभर रूबीच्या परिचर्येसाठी नेमली होती. रात्री ती आपल्या घरी जायची. दोन लहान मुलांना घेऊन ती एकटीच कामं करून जगत होती. तिलाही काम व पैसे मिळाले. रूबीची काळजी ती प्रेमाने घ्यायची. रात्री रूबी अन् आयेशा एकत्र असायच्या.

हसनला बी. कॉम झाल्यावर एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी लागली. सगळ्यांनाच बरं वाटलं. नोकरीनंतरचा वेळ जमाल बाबाकडे जायचा. जमाल बाबाने त्याला सांगितलं, ‘‘तू खुदाचा बंदा आहेस,’’? ‘‘खास माणूस आहेस.’’ हसनला ते पटलं.

बाबा लबाड, भोंदू होता. गोष्टी मोठमोठ्या अन् पोटात पाप…‘‘खुदाच्या मर्जीने मी तुमची दु:खं दूर करायला आले आहे…तुमचं मन माझ्यापाशी मोकळं करा, लोकांना काही तरी आधार हवाच असतो.’’

म्हणायला बाबा स्वत: पैसे घेत नव्हता. त्याच्यासमोर एक चादर अंथरलेली असायची. लोक त्यावर पैसे, धान्य वगैरे ठेवायचे. रात्री बाबा आपल्या खोलीत जाऊन पैसे मोजायचा. त्याचं दुसऱ्या शहरात दुमजली घर होतं. बायको व तीन मुलं होती. तो पैसे घेऊन गावी जायचा. तसं लोकांना वाटे हा काम करून पैसा मिळवतो. इकडे या लोकांना वाटायचं सहा महिन्यांसाठी बाबा नवीन ज्ञान, सिद्धी मिळवण्यासाठी गेलाय. एकूण मूर्खांच्या या बाजारात बाबा मालामाल झाला होता अन् मान, सन्मान मिळवून होता.

बाबांच्या सगळ्या शिष्यात हसनएवढा मूर्ख कोणीच नव्हता. हसनसाठी बाबा बोलेल ते प्रमाण होतं.

एकदा त्याने म्हटलं, ‘‘बाबा, नोकरीत मन रमत नाही…’’

‘‘मग सोड ना नोकरी.’’

‘‘अन् काय करू?’’

‘‘स्वत:चा व्यसाय कर. तुझ्याजवळ तर भरपूर गुण आहेत. कौशल्यं आहेत, तुला नोकरीची गरज काय?’’

‘‘पण व्यवसाय धंदा करायला पैसा कुठे आहे माझ्यापाशी?’’

‘‘का? तुझे अब्बू आहेत, बाजी आहेत, त्यांचे नवरे आहेत, ते करतील ना तुला मदत? शेवटी तू घरातला एकुलता एक मुलगा आहेस…’’

ही गोष्ट हसनला एकदम पटली. त्याने विचार केला, बहिणींकडून पैसा घ्यायचा तर त्यांना आधी खूश केलं पाहिजे. त्यांच्या मनातला त्याच्याविषयीचा राग अन् तिरस्कार दूर करायला हवा. अर्थात्  त्यासाठी थोडा वेळ लागेल. पण काम हमखास होईल. आत तो घरात अधिक वेळ देऊ लागला. बहिणींशी फोनवर बोलू लागला. त्यांना नवल वाटायचं. हसनने रशीद अन् जहांगीरशीही मैत्री वाढवायला सुरुवात केली. सना अन् हीबाने आपसात चर्चा केली.

‘‘हसन थोडा बदललाय ना?’’

‘‘खरंच, खूप बदलला आहे. पण कारण काय?’’

‘‘वाढत्या वयाबरोबर समजूत वाढली असेल, आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला असेल.’’

‘‘तसं असेल तर चांगलंच आहे. हे टिकून राहू दे.’’ मधल्या काळात सनाला दोन मुली एक मुलगा झाला होता. हिबालाही दोन मुली एक मुलगा होता. हसनला मुली सांगून येत होत्या. झोया नावाची एक देखणी, कुललशीलवान मुलगी पसंत केली गेली. लग्न झालं. हसनचं आयुष्य थोडं बदललं; पण डोक्यातून अजून बिझनेसचं भूत गेलं नव्हतं.

झोयाच्या लाघवी स्वभावाने तिनं आल्या आल्या सगळ्यांना आपलंसं केलं होतं. हसनही तिच्याशी छान वागत होता. त्याचं चिडणं, संतापणं कमी झालं होतं. शौकत अन् आयेशाही मुलांचं सगळं आनंदात चाललेलं पाहून निवांत झाली होती.

अजूनही हसन त्या बाबाकडे कधीमधी जातच होता. त्याच्या डोक्यात काय शिजत होतं त्याची कुणालाच कल्पना नव्हती. त्याने दोघी बहिणींना फोन करून सांगितलं की, ‘‘येत्या शनिवारी तुम्ही दोघी, जहांगीर व रशीद अन् सगळी बच्चा कंपनी लंचला या. रात्रीचं जेवणही एकत्रच करू.’’

मधल्या काळात मुलींनी माहेरपणाला येणं बंदच केलं होतं. हे आमंत्रण मिळाल्यामुळे त्याही आनंदल्या. हसनने स्वत: स्वयंपाकघरात झोयाला खूप मदत केली. उत्तम स्वयंपाक तयार झाला. सहा मुलं खूप खेळत खिदळत होती. घरात कितीतरी वर्षांनी इतका आनंद, उत्साह, उल्हास होता.

हसनने म्हटलं, ‘‘माझ्या असं मनात आहे की दर शनिवारी अन् रविवारी लंच आपण एकत्रच घेऊयात.’’

रशीदने म्हटलं, ‘‘याचा अर्थ असा की शनिवारी रात्री मी व जहांगीर सोडून इतर सर्व इथेच राहातील.’’

जहांगीरनेही म्हटलं, ‘‘काही हरकत नाही. या एकत्र भोजनाच्या आनंदासाठी एवढं करायला काहीच हरकत नाही.’’

आणखी काही महिने गेले. झोयाला सुंदर मुलगा झाला. त्याचं नाव शान ठेवलं. बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव सर्व बहीणभाऊ व कुटुंबियांनी साजरा केला. बहीणभावांचं प्रेम बघून आईवडील कृतार्थ व्हायचे.

पुन्हा एक शनिवार आला. जेवणं आटोपली. हसन गप्प गप्प होता. मुलांची दंगामस्ती सुरू होती. सनाने विचारलं, ‘‘ काय झालंय? कसली काळजी आहे? असा गंभीर अन् गप्प का?’’

‘‘काही नाही, बाजी.’’

हिनानेही म्हटलं, ‘‘काही तरी आहेच.’’

शौकत अन् आयेशाही तिथेच होती. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर म्हणाला, ‘‘बाजी, मला काही पैसा हवेत. मला स्वत:चा व्यवसाय करायचा आहे.’’

‘‘अरे? इतकी चांगली नोकरी आहे तुला. हे व्यवसायाचं काय मध्येच?’’

‘‘मी नोकरी सोडतोय…मला पैशांची फारच गरज आहे. कुठून, कशी व्यवस्था करू तेच मला कळत नाहीए.’’

शौकत रागावून म्हणाले, ‘‘ही बिझनेसची कल्पनाच अगदी भिकार आहे. आपण नोकरी करणारी माणसं…आपल्या घरात कुणीच, कधीही व्यवसाय केलेला नाही. इतका पैसा आणायची कुठून? कर्ज काढलं तर फेडणार कसं? मुळात कर्ज देणार कोण? नकोच तो व्यवसाय. शिक्षणाच्या हिशेबाने तुला चांगली नोकरी मिळाली आहे. मुकाट्यानं तीच सुरू ठेवायची.’’

‘‘अब्बू, मी सगळा विचार केलाय. मी पैन् पै फेडेन ना?’’ तो उदास चेहऱ्यानं कपाळावर हात ठेवून बसून राहिला.

किती वर्षांनी मुलगा जरा माणसात आला होता. घरात आनंद, उल्हास वाटत होता. अन् आज तो पुन्हा उदास बसलेला बघून आयेशाला वाईट वाटलं. ती प्रेमळपणे म्हणाली, ‘‘हा विचार मनातून काढून टाक रे बेटा, आपल्याकडे एवढा पैसा नाहीए.’’

हिबाने सहजच विचारलं, ‘‘किती पाहिजेत?’’

‘‘२५-३० लाख.’’

‘‘काय?’’ सगळेच दचकले.

‘‘एवढे पैसे कुठून आणायचे, हसन?’’ सनाने काळजीने विचारलं.

झोया बिचारी गुपचूप बसून होती, तिचा नवरा खरं तिला आजतागायत समजलाच नव्हता. तो कधी काही बोलायचा, कधी कधी एखाद्या धर्मगुरूसारखं मोठमोठ्या गोष्टी करायचा, कधी अगदीच मवाली, बेजबाबदार माणसासारखा वागायचा.

हसन म्हणाला, ‘‘झोयाचे सर्व दागिने विकले तरी पैसा उभा राहाणार नाही. बाजी, तुम्ही मला काही रक्कम द्या. मी तुमची पैन् पै परत करेन. लवकरात लवकर!’’

सनाने आश्चर्याने अन् काळजीने विचारलं, ‘‘हसन, अरे आम्ही पैसा आणायचा कुठून?’’

‘‘तू रशीद आईंशी बोल. ते मला कर्ज मिळवून देतील. बँकेत आहेत ना ते?’’

हिबा म्हणाली, ‘‘मी नाही मदत करू शकणार. अजून माझ्या दोन नणंदा लग्नाच्या आहेत. जहांगीर एकटाच मुलगा आहेत घरातला. त्यांच्यावरच सगळी सगळी जबाबदारी आहे.’’

‘‘तर मग तुझे दागिने दे मला.’’

हिबा दचकली, घाबरून म्हणाली, ‘‘दागिने कसे देऊ? हसन काय बोलतो आहेस?’’

‘‘बाजी, तुमच्या भावाने आयुष्यात प्रथमच तुमच्याकडे काही मागितलं आहे. मी वचन देतो की तुमची पैन् पै मी परत करेन. तुम्ही समजून का घेत नाही?’’ अन् मग एकाएकी धमकी दिल्यासारखा आवाजात म्हणाला, ‘‘जर तुम्ही मला मदत केली नाही तर फार वाईट होईल.’’

शौकत अलींनी दरडावून म्हटलं, ‘‘हसन, बिझनेसचं हे भूत डोक्यातून काढून टाक. अरे, बहिणींकडून पैसा घेऊन व्यवसाय करशील? काही गरज आहे का? या घरच्या त्या माहेरवाशिणी आहेत. त्यांना संकटात टाकू नकोस.’’

हसन प्रचंड संतापला, ‘‘कायम तुम्ही मुलींचीच कड घेतली. सतत त्यांचंच कौतुक केलंत. माझ्यासाठी कधी काही केलंत का? मुलीच तुमच्यासाठी सर्वस्व आहेत.’’ रागाने पाय आपटत हसन घराबाहेर निघून गेला.                       (क्रमश:)

बायकोचं माहेरी जाणं तेव्हा आणि आता

मिश्किली * समीक्षा राऊत

नवरा बायकोची भांडणं तर नेहमीच होतात. पण बायको रागावून माहेरी जाऊन बसली तर नवऱ्याची परिस्थिती काय असते यावर आम्ही विचार केला, तेव्हा लक्षात आलं की वीस पंचवीस वर्षांपूर्वी जी परिस्थिती असायची ती आज राहिली नाहीए.

पूर्वीच्या भांडणाची कारणंही तशी निरागस असायची. ‘‘मिसेस गोखल्यांच्या साडीसारखी साडी मला हवीय,’’ बायकोचा हट्ट असायचा. नवरा जर ऑफिसात बॉसकडून सज्जड दम घेऊन आला असेल तर संतापून ओरडायचा, ‘‘हवी आहे तर आपल्या माहेराहून आण ना?’’

‘‘हे बघा, माझ्या माहेरचं नाव काढायचं नाही,’’ अन् बघता बघता भांडण इतकं वाढायचं की बायको सरळ माहेरी जाऊन बसायची…झालं! इकडे नवऱ्याचा वनवास सुरू.

सकाळी लवकर दूधवाला येतो. त्याच्याकडून दूध घेऊन पुन्हा अंथरूणावर पडल्या पडल्या गाढ झोप लागते. जाग आल्यावर कळतं, उठायला फारच उशीर झाला आहे. तेवढ्यात ती मोलकरीण येते. बायकोनं अगदी निवडून पारखून कुरूप अन् कळकट बाई निवडली आहे, काय बिशाद आहे घरातला पुरूष तिच्याकडे बघायचं धाडस करेल. तिला तशीच परत पाठवायची अन् जे काही फ्रीजमध्ये दिसेल ते पोटात ढकलून बिना इस्त्रीचे कपडे अंगावर घालून, बिना पॉलिशचे बूट पायात घालून ऑफिसला धापा टाकत पोहोचायचं. उशीर झाल्यामुळे साहेबांची नजर चुकवावीच लागते.

दुपारी सगळे आपापले डबे उघडतात अन् चविष्ट भाज्यांच्या वासानं भूक एकदम खवळते. कॅन्टीनचं बेचव जेवण घशाखाली उतरत नाही. मनात येतं, ‘उगीचच बायकोशी भांडलो…ती माहेरी गेली नसती तर निदान छानसा जेवणाचा डबा तर मिळाला असता.’

सायंकाळी गेल्यावर सकाळचं दूध तसंच ओट्यावर दिसतं. चहा केला तर तो नासतो, कारण दूधच नासलेलं असतं. टीव्हीवरचे कार्यक्रम फारच रटाळ वाटतात. रात्रीच्या जेवणासाठी खिचडीचा बेत ठरतो. स्वयंपाकघरात कधी जावंच लागलं नव्हतं. तरीही डाळतांदूळ धुवून एकत्र करून कुकरमध्ये शिजायला लावलं. पाणी कमी झाल्यामुळे सेफ्टी वॉल्व्ह उडाला. स्वत:लाच शिट्या घालत तीन जिने उतरून स्कूटरला किक मारून जवळचाच एक धाबा गाठला. छोले भटूरे खाऊन घरी आल्यावर अंथरूणावर झोपू म्हटलं तर सकाळचे ओले कपडे अन् टॉवेल तिथंच पसरून बसलेले. त्यांना बाजूला ढकलून झोपायचा प्रयत्न केला. त्यावेळी बायकोची फारच आठवण आली…फोन करून बोलावून घ्यावं का? पण तेवढ्यात पुरूषी अहंकाराने फणा काढला. स्वत: गेली आहे, तर येईल स्वत:च!

सकाळी मोलकरीण लवकरच आली. स्वयंपाकघरातला पसारा बघून वैतागली, कुकरची दुर्दशा बघून अधिकच भडकली.

‘‘ते न…ती खिचडी जरा लागली खाली,’’ कसंबसं तिला चुचकारत…ही बया काम न करता गेली तर केर फरशी, भांडी, ओटा,  सगळंच गळ्यात येणार.

सकाळच्या न्याहारीला बायकोच्या हातचा चविष्ट उपमा पुन्हा पुन्हा आठवतो. बायकोला फोन करावा का? पण पुन्हा तोच पुरूषी अहंकार फणा काढतो.

सायंकाळी ऑफिसातून घरी पोहोचलो तोच मिसेस गोखले घरात शिरल्या. ‘‘साखर हवी होती थोडी,’’ खरं तर बायको कुठं गेलीये अन् कधी यायची आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं. कालही विचारलंच तिनं, ‘‘वहिनी घरी नाहीएत का?’’

विदाऊट ब्रेकफास्ट ऑफिसला जाणं, दुसऱ्यांच्या लंच बॉक्सकडे आशाळभूतपणे बघणं, हॉटेलचं जेवण, त्यामुळे पोट बिघडणं, दुरदर्शनचे अळणी कार्यक्रम, चुरगळलेले शर्ट पॅण्ट अन् धुळीनं माखलेले बूट घालणं अन् रात्री ओल्या टॉवेलमुळे गार झालेल्या अंथरूणावर झोपणं…सगळंच असह्य होतंय. विरंगुळाशोधायचा तरी कुठे?

ऑफिसात एकदोघी स्त्रिया आहेत पण त्या विवाहित आहेत. इतर कुठं जाण्याची सोयच नाही. कुणी बघितलं किंवा बायकोला कळलं तर सोसायटीत काय किंमत राहील? मुलांचीही आठवण येतेच आहे…एकूण सगळंच अवघड आहे.

शिवाय मिसेस गोखल्यांचं पुन्हा:पुन्हा विचारणं, ‘‘वहिनी कधी येणार?’’ त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या साडीसारखी साडी बायकोला आणून देणं सोपं नाही का? दोन दिवसात अक्कल ठिकाणावर आली. बायकोला घ्यायला मुकाट्यानं सासुरवाडी गाठली. बायकोही बिचारी वाटेकडे डोळे लावून बसलीच होती. कधी नवरा घ्यायला येतोय अन् कधी आपण घरी जातोय. म्हणजे एकूणात हॅप्पी एंडिंग!

आजचे पती…वय ३३-३५ वर्षं. एका मुलाचे वडील. करियरच्या सोपानावर पायऱ्या चढताहेत. त्यांची बायको माहेरी जाण्याची शक्यता तशी कमीच. हल्ली तर सासरमाहेर एकाच शहरात असल्यामुळे बायको महिन्यातली एखादी संध्याकाळ फार तर माहेरी जाते. कारण तिही नोकरी करते अन् साप्ताहिक सुट्टीला तिलाही आउटिंगची गरज असते.

माहेरहून क्षणाक्षणाला बातम्या कळतच असतात. कारण सोशल मिडिया अन् नेटवर्क शिवाय मोबाइलचे कॉल असतातच.?खरं तर माहेरी जाणं आता तसं गरजेचं नाहीए. पण मुलं लहान असताना माहेरी त्यांना सोडून नोकरीवर जायचं अन् येताना घेऊन यायचं असं व्हायचं खरं. आता, बायको रूसून माहेरी गेली तर किती फायद्याचं असतं ते बघा. काळाचा महिमा म्हणतात ना? तसंच…

सकाळी ‘‘अहो उठा, उठा ना, किती वेळ लोळायचं म्हणते मी,’’ वगैरे ऐकावं लागत नाही. ‘‘मुलांना?शाळेच्या बसपर्यंत सोडून या,’’ हा धोशा नाही. ओला टॉवेल बेडवर फेकला तरी ओरडणारं कुणी नाही. सकाळी सकाळीच कामावर येणारी स्वच्छ कपड्यातली, टेचात राहणारी मोलकरीण आपल्याला ‘‘गुड मॉर्निंग सर’’ म्हणते. मन प्रसन्न होतं. दिवस चांगला जाणार असल्याची ग्वाही मिळते.

ब्रेकफास्ट स्वत:लाच छानपैकी जमतो. ब्रेड, बटर, ऑमलेट किंवा हाफफ्राय. त्यासोबत ‘डिपडिप’चा चहा. मोकरणीनं तोवर घर स्वच्छ केलेलं असतं. आपण अगदी वेळेतच ऑफिस गाठतो.

बायको माहेरी गेलीय हे ऐकून सगळे मित्र खुशीत येतात. ‘‘पार्टी व्हायलाच हवी’’चा गजर करतात.

ऑफिसातल्या काही जरठ कुमारिका चान्स घ्यायला बघतात. डब्यातून छान छान पदार्थ आणून खायला घालतात. हल्लीच्या नवऱ्यांना फ्लर्ट करायला पूर्ण मोकळीक असते. मज्जाच मजा!

उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसा. घरी कुणी विचारणारं नाही. रात्रीचं जेवण एखाद्या चांगल्याशा रेस्ट्रॉरण्टमध्ये ऑफिसमधल्या एखाद्या कलीग लेडीसोबत घ्या किंवा घरीच काही छानसं मागवून घ्या.

पर्याय भरपूर आहेत. सुट्टीच्या दिवशी इंटरनेटवर बघून एखादी सोपीशी, छानशी रेसिपी तयार करणं यातला आनंद काय वर्णावा?

हल्ली बायकांना समानतेच्या अधिकारामुळे नवऱ्याला स्वयंपाकघरात कामं करवून घेता येतात. त्याचा फायदा म्हणून नवरेही बऱ्यापैकी स्वावलंबी झाले आहेत.

वॉशिंग मशिनमध्ये कपडे ऑटोमॅटिक धुवून होतात, नाहीतर ‘‘गुड मार्निंग सर’’ धुवून देते. ढीगभर चॅनल्समधून टीव्हीदेखील हवी तेवढी करमणूक करायला तयार असतो. लॅपटॉप अन् स्मार्ट फोन तैनातीत आहेत. तुमची बायको कुठं गेलीय, हे विचारायला कुणीही येत नाही. सवडच नाहीए कुणाला, इतरांच्या उचापती करायला.

मुलं रोजच फोन करतात. बायकोही तिचं आउटिंग आटोपून फ्रेश होऊन घरी येते. घराचा ताबा घेते. पुन्हा सगळं जैसे थे होतं.

पूर्वी नवऱ्यांना वाटायचं बायकोनं आपल्याला सोडून माहेरी जाऊ नये…आता नवऱ्यांना वाटतं, अधूनमधून गावातल्या गावात का होईना, शनिवार, रविवारच्या सुट्टीत तरी बायकोनं माहेरी जावं.

आई होण्याचं सुख

कथा * आशा सोमलवार

शाळेतून आलेल्या तारेशनं संतापानं आपलं दफ्तर फेकून आईकडे धाव घेतली, ‘‘आई, कसलं घाणेरडं नाव ठेवलं आहेस गं माझं. तारेश…वर आणखी आडनाव तारकर. मुलं मला चिडवतात. सर्व हसतात…’’ बोलता बोलता तो रडकुंडीला आला.

आईनं त्याला जवळ घेत विचारलं, ‘‘काय म्हणतात?’’

‘‘तारू तारकर कुत्र्यावर वारकर…’’

‘‘वेडी आहेत ती मुलं…अरे, तुझ्या आजीनं ठेवलंय हे नाव, तू झालास त्या दिवशी पौर्णिमा होती. तारेश म्हणजे ताऱ्यांचा राजा म्हणजे चंद्र. इतकं सुंदर नाव आहे. तुझ्या रूपाला ते शोभतंही आहे…’’

‘‘पण माझं नाव आजीनं का ठेवलं? शाळेत मला जायचंय, आजीला नव्हतं जायचं…मला नाही आवडत हे नाव…बदलून टाकूयात.’’ तारेशचा थटथयाट संपत नव्हता.

‘‘अरे, तू तारेश आहेस म्हणूनच तुला चंद्रिका भेटेल…सुंदर सून आम्हाला मिळेल,’’ आईनं समजूत घालत म्हटलं.

‘‘नकोय मला चंद्रिका…मला तर सूर्य आवडतो. झगझगीत प्रकाश अन् ऊब देणारा.’’ तारेश म्हणाला. तेव्हा त्याला कुठं समजत होतं की त्याला चंद्रिका का नको होती अन् सूर्यच का आवंडत होता?

‘‘अभिनंदन सर! मुलगी झाली आहे,’’ नर्सनं येऊन सांगितलं तसा तारेश भानावर आला.

‘‘मी तिला बघू शकतो? हात लावू शकतो?’’ त्यानं अधीरपणे विचारलं.

‘‘हो…हो…या, आत या.’’ नर्सनं हसून म्हटलं. नर्सनं हळूवारपणे ते बाळ तारेशच्या हातात दिलं. किती नाजूक, केवढीशी…गोरीपान, मिटलेले डोळे…काळं भोर जावळ…तारेशनं हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले अन् पुन्हा नर्सच्या हातात तिला सोपवलं. नर्सनं तिला तिच्या सरोगेट आईजवळ झोपवलं. तारेश मनात म्हणाला, ‘‘सोमल, तुझी आठवण आली या बाळाला बघून…अगदी तुझंच रूप आहे रे…’’

शाळकरी वयातच तारेश इतर मुलांपेक्षा वेगळा होता. अभ्यासात तो भलताच हुशार होता. पण त्याच्या मनात मुलींविषयी अजिबात आकर्षण नव्हतं. मात्र त्याला त्याचे स्पोर्ट्स सर अशोक फार आवडायचे. त्यांचा सहवास मिळावा म्हणून तो गेम्स पीरियड कधी टाळत नसे. जिमनास्टिक शिकवताना सरांचा हात अंगाला लागला की तो मोहरून जायचा. त्या स्पर्शानं तो सुखावत असे. अशोक सर फक्त तो एक मेहनती विद्यार्थी आहे म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे. यापलीकडे त्यांना तारेशविषयी फार काही वाटलं नव्हतं.

कॉलेजच्या वयाला जेव्हा इतर मित्र मुलींवर इंप्रेशन मारण्यात दंग असायचे. तेव्हा तारेश स्वत:तच दंग असे. पण सोमलला बघितलं अन् तो जणू त्याच्या प्रेमातच पडला. सोमललाही तारक आवडला. त्यांची चांगलीच मैत्री झाली. ज्या दिवशी कॉलेज नसे, त्या दिवशी तारकच्या जिवाची घालमेल व्हायची. सोमल कधी एकदा दिसतो असं त्याला व्हायचं.

कॉलेजचं शिक्षण संपलं अन् बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घ्यायची असं दोघांनी ठरवलं. दोघं एकत्र राहतील, एकमेकांची सोबत, मदत होईल या उद्देशाने दोघांच्या घरच्यांनीही आनंदानं परवानगी दिली. दिल्लीच्या उत्तम कॉलेजात दोघांना एडनिशन मिळालं. एका जवळच्याच कॉलनीत वन रूम किचन फ्लॅट दोघांनी मिळून भाड्यानं घेतला.

कॉलेज व्यवस्थित सुरू होतं. कधी ते दोघं घरीच स्वयंपाक करायचे, कधी बाहेर जेवण घ्यायचे. दोघांची जोडी कॉलेजात ‘रामलक्ष्मण’ म्हणून ओळखली जायची. अभ्यासात दोघंही हुशार होते. प्रोफेसर्स त्यांच्यावर खुश होते.

बघता बघता शेवटचं सेमिस्टर सुरू झालं. कॉलेजात कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले होते. अनेक मुलं चांगल्या चांगल्या कंपन्यांनी निवडून घेतली. सोमलला हैदराबादच्या कंपनीत नोकरी मिळाली तर तारेशला बंगलोरच्या कंपनीत. दोघांनाही उत्तम कंपनीत भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे त्यांना आनंद तर झाला होता. पण एकमेकांपासून दूर राहावं लागेल हा विचार मात्र अस्वस्थ करत होता. दोघंही निर्णय घेताना हवालदिल झाले होते. नोकरी घ्यायची म्हटलं तर मित्र सोडावा लागणार. मित्राजवळ रहायचं तर नोकरी सोडावी लागणार…कठिण अवस्था होती.

त्या रात्री एकमेकांना मिठी मारून दोघंही खूप रडले. जेवणही करायला सुचलं नाही. त्या रात्री त्यांना कळलं की ते एकमेकांसाठीच आहेत. का त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही, का ते एकमेकांशिवय राहू शकत नाही याचा उलगडा त्यांना त्या रात्री झाला. जगाच्या दृष्टीनं त्यांचं नातं, धर्माविरूद्ध किंवा अनैसर्गिक होतं. कारण दोघंही ‘गे’ होते. पण त्यांना त्याची खंत नव्हती.

दोघांनीही आपल्या प्लेसमेंट रद्द केल्या. त्यांनी दिल्लीत राहूनच काम मिळवण्याचा प्रयत्न केला अन् योगायोग असा की दोघांनाही एकाच मल्टीनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी मिळाली. दोघांचंही आयुष्य रूळावर आलं.

शिक्षण झालं. उत्तम नोकरी मिळाली म्हणताना दोघांच्याही घरी आता त्यांच्या लग्नाचा विषय ऐरणीवर आला. दोघांच्या घरी मुली बघायला सुरूवात झाली. पण हे दोघं आपल्यातच दंग! त्यांचं जगच वेगळं होतं. बाहेर केवढं वादळ घोंगावतंय याची त्यांना कल्पनाही नव्हती.

वारंवार जेव्हा मुली नाकारल्या जायला लागल्या, तेव्हा तारेशच्या आईच्या मनात शंका आली. त्याचं कुठं प्रेमप्रकरण तर नाहीए? कुणी मुलगी त्यानं पसंत करून ठेवली आहे का?

सोमलच्याही घरी हीच परिस्थिती होती. नेमकं काय कारण आहे, सोमल न बघताच मुली का नाकारतो आहे हे जाणून घेण्यासाठी सोमलची आई दिल्लीला त्यांच्या फ्लॅटवर पोहोचली. येण्याबद्दल तिनं काहीच कळवलं नव्हतं. त्यांचे दोघांचे हावभाव बघून तिला काही तरी संशय आला. तिने फोन करून तारेशच्या आईवडिलांना व सोमलच्या घरच्यांनाही बोलावून घेतलं.

सगळेच एकत्र समोर बसलेले…दोन्ही मुलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत. एकमेकांसोबतच आयुष्य घालवू इच्छितात. त्यांच्यासाठी मुली बघणं बंद करा. प्रथम तर दोघांच्याही घरच्यांनी समाजात केवढी ब्रेअब्रू होईल, लोक काय म्हणतील वगैरे सांगून बघितलं. सोमलच्या आईनं तर ‘‘तुझ्या बहिणीचं लग्न अशामुळे होणार नाही,’’ असा धाक घातला. पण दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते. मुलं ऐकत नाहीत म्हणताना चिडलेल्या अन् दुखावल्या गेलेल्या दोघांच्याही घरच्यांनी एकमेकांच्या कुटुंबांना भरपूर दोष दिला. खूप भांडाभांडी झाली. बातमी सर्व अपार्टमेंटमध्ये पसरली. घरमालकांन जागा सोडा म्हणून फर्मान काढलं.

एवढ्यावरही थांबलं नाही. बातमी त्यांच्या ऑफिसमध्येही पोहोचली. प्रत्येक जण त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघत होता. जणू ते परग्रहावरून आलेले लोक आहेत. कालपर्यंत जे सहकारी एकत्र काम करत होते, एकत्र जेवत होते, पार्ट्या, पिकनिक करत होते ते आता चक्क टाळू लागले. बघताच तोंड फिरवू लागले. दोघांना अस्पृश्य असल्यासारखे वागवू लागले. त्यांना ऑफिसात काम करणं अशक्य झालं.

सोमलच्या बॉसनं तर त्याला एकट्याला बोलावून घेऊन समजावलं, ‘‘हे बघ सोमल, तुमच्यामुळे ऑफिसातलं वातावरण बिघडतंय. ऑफिसमध्ये लोक कामं कमी करताहेत, तुमच्याबद्दलच्या चर्चेत वेळ जास्त घालवताहेत. मला वाटतं, तुम्ही दोघांनी राजीनामा द्यावा. आम्ही तुम्हाला काढलं तर तुम्हाला इतरत्र नोकरी मिळवताना अडचण येईल. तुम्ही राजीनामा दिला तर तुमच्या चांगल्या सीपीमुळे तुम्ही दुसरीकडे कुठं पुन्हा जॉब मिळवू शकाल.’’

काळ तर कठिणच होता. शेवटी दोघांनी दिल्ली सोडायचा निर्णय घेतला. त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. तेवढ्यात सोमलच्या एकुलत्या एका बहिणीचं राखीचं लग्नही झालं, पण घरच्यांनी त्याला कळवलंही नाही.

घरच्यांनी नाव टाकलं होतं. दिल्लीतल्या मित्रांशी संपर्क तुटला होता. ऑफिसचे सहकारीही दुरावले होते. मुंबईत त्यांना कुणीही ओळखत नव्हतं. त्यांचं जग त्या दोघांपुरतंच मर्यादित होतं. पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू झालं होतं.

सोमलच्या एका चुलत वहिनीनं लीनानं मात्र एवढं सगळं झाल्यावरही सोमलशी संपर्क ठेवला होता.

एकदा अवचितच लीना वहिनीचा फोन आला की राखीच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ऐकून सोमलला फारच दु:ख झालं. बहिणीवर फार माया होती त्याची.

यावेळी तिला आधाराची गरज असेल असा विचार करून तो तडक तिकिट काढून गाडीत बसला.

राखीच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याला मिठी मारून राखी रडू लागली. तेवढ्यात तिची सासू आली अन् तिला ओढत आत घेऊन गेली. सोमलला ऐकवलं, की त्यान पुन्हा या घरात पाय ठेवू नये. तिच त्याची व राखीची शेवटची भेट होती.

एका सुट्टीच्या दिवशी दोघं एक सिनेमा बघत होते. त्यात तीन पुरूष एका बाळाला वाढवतात. त्या बाळाला आई नसते.

सोमलनं विचारलं, ‘‘तारेश, आपल्याला बाळ होऊ शकतं?’’

‘‘कुणास ठाऊक! पण बाळ तर आईच्या गर्भाशयातच वाढतं ना? मग कसं होणार?’’ तारेशनं म्हटलं.

‘‘काही तरी मार्ग असेलच ना? विज्ञानानं एवढी प्रगती केली आहे…आपण सरोगसीची मदत घेतली तर?’’

‘‘तसं करता येईल. पण त्यात काही कायदेशीर अडचणी असू शकतात. कायद्यानं आपल्यासारख्यांना सरोगसीची परवानगी आहे का हे बघावं लागेल. आपल्यात सरोगेट मदर कोण देणार? आपले दोघांचेही नातलग आपल्याला दुरावले आहेत, तरीही आपण या विषयातल्या एखाद्या तज्ञाला भेटूयात. त्याच्याकडून खात्रीची माहिती मिळेल. आता हा विषय नकोच!’’ तारेशनं त्या दिवशी तो विषय तिथंच थांबवला.

एकदा काही कारणानं तारेश एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथं आयव्हीएफ सेंटर बघून त्याचे पाय तिथंच थबकले. त्याला एकदम सोमलचं स्वप्नं ‘आपलं बाळ असावं’ आठवलं. त्यानं आत जाऊन तिथल्या प्रमुख डॉक्टर सरोज यांची अपॉइंटमेंट मिळवली अन् ठरलेल्या दिवशी सोमलला बरोबर घेऊन तो तिथं पोहोचला.

डॉ. सरोजनं त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं अन् सांगितलं की सोमलचं पिता बनण्याचं स्वप्नं आयव्हीएफ अन् सरोगसीच्या माध्यमातून वास्तवात येऊ शकतं.

दोघांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघून डॉ. पुढे म्हणाल्या, ‘‘तुम्ही ऐकलंच असेल की अभिनेता तुषार कपूर या सरोगसीच्या टेक्निकचा वापर करून सिंगल पिता झाला आहे. सरोगसी टेक्निकच्याच माध्यमातून कुणा फिल्म इंडस्ट्रीवाल्याला जुळी मुलं आहेत. आमच्याकडे बऱ्याच सिंगल पुरूषांनी आई, वडिल होण्याची इच्छा दर्शवली आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशनही केलं आहे. तुम्हीही रजिस्ट्रेशन करू शकता.’’

‘‘पण भाड्यानं गर्भाशय कसं मिळेल?’’

‘‘त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुणा जवळच्या नातलग किंवा मित्रांची मदत घ्यावी लागेल.’’

‘‘आता कुणाची मदत घ्यायची ते तुम्हीच बघा. ठरवा त्या बाबतीत. मी मदत करू शकत नाही,’’ एवढं बोलून डॉक्टरांनी पुढल्या व्हिजिटरसाठी बेल वाजवली.

दोघं घरी परतले. सोमलला एकदम लीना वहिनीची आठवण झाली. त्यानं तिला फोन लावला. ‘‘हॅलो वहिनी, कशी आहेस?’’

‘‘सोमल भाऊजी, आज कशी काय आठवण आली?’’ तिनं प्रेमानं विचारलं. मग सोमलनं तिला सर्व परिस्थिती सांगितली अन् तिची मदत मागितली.

तिनं शांतपणे ऐकून घेतलं. मग म्हणाली, ‘‘मला क्षमा करा, सोमल भाऊजी, पण मी तुमची मदत करू शकणार नाही. मुळात तुमचे भाऊ तयार होणार नाहीत आणि माझ्यासाठी माझा नवरा आणि कुटुंब महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळतंय ना? मला क्षमा करा.’’

सोमलच्या मनातली अंधुकशी आशाही संपली. पण तारेशनं ठरवलं, इंटरनेटची मदत घ्यायची. इंटरनेटवर हवी ती माहिती मिळवता येते. दोघंही आता उत्साहानं इंटरनेटवर शोध घेऊ लागले. त्यातच एका प्रेस रिपोर्टरची कव्हर स्टोरी त्यांच्या वाचण्यात आली. तिनं लिहिलं होतं की गुजरातमध्ये आणंद या गावी ‘सरोगेट मदर’ सहज उपलब्ध होतात. इथं सरोगसीच्या माध्यमातून किमान १०० बाळं जन्माला आली आहेत. हे वाचताच दोघांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी सरळ आणंद गाठलं. कारण इथंच त्यांचं स्वप्नं प्रत्यक्षात येणार होतं. तिथं एका टेस्ट ट्यूब बेबी क्लिनिकच्या बाहेरच त्यांना एक दलाल भेटला. त्यांचं नवखेपण आणि बाळाबद्दलची अतोनात ओढ अन् असोशी बघून त्यांच्याकडून भरपूर पैसे घेतले. हा दलाल सरोगसीसाठी भाड्यानं गर्भाशय मिळवून देण्याचा व्यवसाय करत होता. त्यानं आपल्या गर्भाशयात मूल वाढवण्यासाठी तयार असलेल्या स्त्रीशी त्यांची भेट घडवून आणली. दोनच दिवसात सर्व औपचारिक गोष्टींची पूर्तता करून दोघं मुंबईला परत आले

तेवढ्यात एक दुदैर्वी घटना घडली आणि तारेशच्या आयुष्यात अंधारच पसरला. दोघं मित्र पिता होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि पहिल्या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी खंडाळ्याला जायला निघाले होते. तेवढ्यात हायवेवर भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रकनं त्यांच्या गाडीला धडक दिली. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल केलं, पण सोमल हे जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकूनही घरून कोणी आलं नाही.

एका महिन्याने त्या दलालाचा फोन आला. तारेशनं त्याला घडलेली घटना सांगितली आणि मृत सोमलची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचेच गोठवलेले शुक्राणू वापरून बाळ जन्माला घालण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी दलालानं अजून काही रकमेची मागणी केली. तारेशनं साठवलेला सर्व पैसा खर्च केला.

सगळ्या औपचारिक बाबींची पूर्तता झाली आणि तारेशचे स्पर्म बँकेत सुरक्षित ठेवलेले शुक्राणू अन् आईचं स्त्रीबीज यांचा संयोग घडवून सरोगेट आईच्या गर्भाशयात भ्रूण वाढेल अशी व्यवस्था केली गेली. नऊ महिने पूर्ण झाले अन् बाळाचा जन्म झाला. ती मुलगी होती…सोमलची मुलगी.

एकट्यानं तान्हं बाळ वाढवणं सोपं नाही हे तारेश जाणून होता. पण सोमलचं स्वप्नं पूर्ण करणं हाच त्याच्या आयुष्याचा एकमेव उद्देश उरला होता. त्यासाठी तो मानसिक दृष्ट्याही स्वत:ला सक्षम करत होता.

कॉन्टॅ्रक्टप्रमाणे सरोगेट आईनं दोन महिने मुलीला आपलं दूध पाजलं आणि नंतर तारेशच्या हातात ते बाळ ठेवून ती निघून गेली.

त्या एवढ्याशा मुलीला घेऊन तारेश सोमलच्या घरी गेला. ही मुलगी सोमलची आहे. त्याची इच्छा होती म्हणूनच या मुलीचा जन्म झाला आहे, हे सांगितलं. सोमलची विधवा बहिण राखी पटकन् पुढे आली. तेवढ्यात त्याच्या आईवडिलांनी तिला अडवलं.

तारेश म्हणाला, ‘‘मला ठाऊक आहे, तुम्ही माझा तिरस्कार करता. तुमचा माझ्यावर राग आहे. पण या बाळात तुमच्या मुलाचा अंश आहे. सोमल जिवंत असता तर त्यालाही बाळासाठी आजीआजोबा व आत्याचे आर्शिवाद व प्रेम मिळायला हवं हेच वाटलं असतं. मी हर प्रयत्नानं या बाळाला वाढवीन. मोठं करीन. कारण ही मुलगी सोमलची आहे. तुम्ही तिला नाकारलीत तरी मी तिला वाढवीनच.’’ तो मुलीला घेऊन माघारी वळला.

दाराबाहेर त्याचं पाऊल पडण्याआधीच मागून सोमलच्या आईची हाक ऐकू आली, ‘‘थांब…’’

तारेशनं वळून बघितलं. बाळाचे आजीआजोबा आपले अश्रू पुसत पुढे येत होते.

आजोबा म्हणाले, ‘‘आमचा मुलगा गेला तरी त्याची ही मुलगी आम्ही आमच्यापासून दूर होऊ देणार नाही. आम्ही हिला वाढवू.  उत्तम सांभाळू. आमची दुधावरची साय आहे ती. तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही…’’

तो म्हणाला, ‘‘पण, ही मुलगी हे आम्हा दोघांचं स्वप्नं होतं?’’

‘‘होय…तूच या मुलीचा बाप असशील पण आता तिला आईची जास्त गरज आहे…कळतंय ना तुला? तुझी हरकत नसेल तर राखी या बाळाची आई होईल.’’ सोमलची आई म्हणाली.

‘‘पण…पण तुम्हाला खरं काय ते ठाऊक आहे. राखीला मी पत्नीसुख देऊ शकत नाही.’’ गोंधळलेल्या तारेशनं म्हटलं.

‘‘मला पत्नीचं नाही, आईचं सुख हवंय, मी आई होण्याचं सुख अनुभवू इच्छिते.’’

राखीनं पुढं होऊन बाळाला आपल्याकडे घेत म्हटलं.

राकेशला वाटलं, ‘बाळाच्या त्या निरागस चेहऱ्यात जणू सोमलचाच तृप्त, समाधानानं उजळलेला चेहरा तो बघतोय…’

ती परत आली

*कथा  माधुरी कुलकर्णी

‘‘पॅरिसला जाणाऱ्या प्रवाशांनी गेट नं ४ कडे जावे’ अशी घोषणा झाल्यावर प्रवासी त्या गेटकडे जाऊ लागले. अर्थातच मोना मोहनबरोबर लगबगीने त्याच्या हातात हात गुंफुन पुढे सरकली. या सुंदर जोडप्याने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते. काळ्या रंगाच्या उंची सूटमध्ये मोहन रूबाबदार दिसत होता व मोना तर फारच आकर्षक वाटत होती. तिने डिझायनर ड्रेस घातला होता. पर्सही त्याला साजेशी होती. उंच टाचेचे बूट तिने घातले होते. कानातले हिऱ्यांचे लोंबते डूल तिच्या सौंदर्यांत भरच घालत होते.

एकदाचे विमानाने आकाशात उड्डान घेतले व मोनाने सूटकेचा एक नि:श्वास टाकला. विमानाबराबरे तिचे मन पण सातव्या आसमंतात उडत होते. आपले ईस्पित लवकरच साध्य होणार यात तिला आता शंका वाटत नव्हती.

पॅरिसला गेल्यावर काय आणि कसे कार्यक्रम पार पाडायचे याची मोना व मोहन चर्चा करू लागले. दोघांनाही आर्किटेक्चरची परीक्षा दिली होती. मोहन एका प्रसिद्ध उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा होता. अमाप संपत्तीचा वारस होता. त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. विदेशात शिक्षण घेतल्यामुळे त्यच्या वागण्याबोलण्यात एक रूबाब होता.

याउलट मोना एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तिचे वडिल एक सरकारी अधिकारी होते. ती व तिचा भाऊ, आईवडिल व आजी असे कुटुंब होते. उच्चभ्रू परिसरात त्यांना क्वार्टर्स मिळाले होते. तिच्या आईचे माहेर श्रीमंत असल्यामुळे तिला आपल्या मुलांनी पण चांगल्या शाळेत जावे, झकपक कपडे घालावे, थाटात राहावे असे वाटत असे. त्यामुळे मोनाला तिने कॉन्व्हेंट शाळेत घातले होते. साहजिकच मोना त्या वर्तळात रमली. श्रीमंत मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाला गेल्यावर तेथील थाटमाट बघत राही. त्यांच्या पार्ट्यां पण आलिशान असत. आपण ४ खोल्यांच्या घरात राहतो, सेकंडहँड गाडीतून प्रवास करतो या गोष्टीचे तिला वैषम्य वाटत असे.

लहानपणापासूनच तिला श्रीमंतीचे आकर्षण वाटू लागले होते. आलिशान बंगल्यात राहावे, मर्सिडीज गाडीतून फिरावे, उंची हॉटेलात जेवण करावे असे तिला वाटत असे. आपल्या मैत्रीणींपेक्षा आपल्यात काय कमी आहे. थोडी मोठी झाल्यावर अपण रूपवान आहोत या गोष्टीची तिला जाणीव झाली. तिच्याभोवती मुलांचा सतत गराडा असे. तिच्याशी दोन शब्द बोलायला मिळावेत म्हणून प्रत्येकजण धडपडत असे. मोनासुद्धा त्यांना आपल्या मोहक हास्याने उत्तेजन देत असे.

तिच्या म्हाताऱ्या आजीला तिचे हे उच्छृंखल वागणे अजिबात पसंत नव्हते. ती जुन्या वळणाची बाई होती. मुलींचे वागणे शालीन, सुसंस्कृत असावे. शिक्षणाला तिचे प्रोत्साहनच होते, पण मुलींसाठी त्यांचे शील सर्वात महत्त्वाचे असते. तिचं म्हणणं होतं, ‘काचेच्या भांड्याला तडा गेला की संपले’ मोनाला हे जुने विचार कसे पटावे, तिचे आजीवर फार प्रेम होते. ती आजीला म्हणे, ‘आजी, हे विचार जुने द्ब्रालेत. आजची स्त्री सर्वच आघाड्यांवर पुढे आहे. आजकालची जोडपी विवाह न करताच एकत्र राहतात. काळ झपाट्याने बदलत आहे, तेव्हा काळाबरोबरच जाण्यात शहाणपण आहे.’

मित्रमैत्रीणींबरोबर सहलीला जाणे, डिस्कोथेकमध्ये रात्रीपर्यंत डान्स करणे हे तिच्यासाठी या सामान्य बाबी होत्या. श्रीमंतांची मुले तिच्याकरता पायघड्या घालण्यात तयार होतीच. तिच्या आईला लेकीच्या या वागण्यात काही वावगे वाटत नसे, उलट तिला तिचा अभिमानच वाटत असे.

मोनाला सौंदर्याबरोबरच बुद्धिचीही देणगी मिळाली होती. बारावीनंतर ती आर्किटेक्चर बनू इच्छित होती. त्यासाठी ती उत्तम मार्कांनी पास झाली. याच दरम्यान तिची उमेशशी ओळख झाली. उमेश बुद्धिमान व महत्त्वाकांक्षी तरुण होता. लाघवी बोलण्याने तो सर्वांना आपलेसे करी. आर्किटेक्चरची डिग्री घेतल्याबरोबर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. गडंगज श्रीमंत नसले तरी त्याचे वडिल बऱ्यापैकी श्रीमंत होते. जुहूसारख्या पॉश एरियात त्याने आपले ऑफिस थाटले. त्याला मोनामध्ये स्पार्क जाणवल्यामुळे त्याने तिला आपला पार्टनर होण्याचे आमंत्रण दिले. इंटीरिअर डिझायनिंगसाठी लागणारी सौंदर्यदृष्टी मोनाकडे उपजतच होती. अल्पावधीतच त्यांचे ऑफिस चांगले चालायला लागले.

एका मोठ्या क्लाएंटशी डील झाल्यामुळे आज उमेश फारच खुशीत होता. त्याने मोनाला ‘सन अॅन्ड सॅन्ड’मध्ये पार्टी देण्याचे ठरवले.

मोनाने त्यादिवशी विशेष मेकअप केला होता. डिझायनर ड्रेस तिच्या मुळच्या सौंदर्याला उठाव आणत होता. तिने हॉटेलमध्ये प्रवेश केला, तेव्हा अनेक नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. जणू काही ती मोठी स्टार असावी. वेटर अदबीने तिला त्यांच्या टेबलकडे घेऊन गेला. तिथे एक रूबाबदार तरुण आधीच स्थानापन्न झाला होता.

मोना म्हणाली, ‘‘आय अॅम सॉरी, कदाचित मी चुकून दुसऱ्या टेबलवर आले आहे.’’

त्यावर तो तरुण मोनाला आश्वस्त करत म्हणाला, ‘‘मॅडम आपण अगदी बरोबर आला आहात. आपली ओळख नसल्यामुळे आपला गोंधळ उडाला आहे एवढेच.’’

इतक्यात उमेश घाईगडबडीत तिथे आला व म्हणाला, ‘‘सॉरी मोहन, मला यायला थोडा उशिरच झाला.’’

दोघांची ओळख करून देत तो बालला, ‘‘मोना, हा माझा परममित्र मोहन आणि मोहन ही माझी बिझनेस पार्टनर मोना.’’

‘‘मोना, हा मोहन आताच सिव्हील इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून परदेशातून आला आहे. आम्ही लहानपणी एकाच शाळेत शिकलो आहोत. याच्या वडिलांचे नाव तर तू ऐकलेच असशील, प्रसिद्ध उद्योगपती अनिल किर्लोस्कर.’’

‘‘ओह! त्यांना कोण ओळखत नाही, ग्लॅड टू मीट यू मि. मोहन.’’

अत्यंत प्रसन्न वातावरणात जेवण पार पडले. मोनाचे घर मोहनच्या घराच्या रस्त्यावरच असल्यामुळे त्याने तिला घरी ड्रॉप करण्याचा प्रस्ताव दिला.

बाहेर येताच त्याच्या मर्सिडीज बेझबाने तिचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या सहवासात घर कधी आले ते तिला कळलंच नाही. त्यांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला.

‘‘हॅलो, मोना, मी मोहन. तुला इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन केलाय. संध्याकाळी ८ वाजता हॉटेल ताज, उमेमशही येणार आहे,’’ मोहन बोलला.

या आमंत्राणाने मोना फार खूश जोली. मोहनसारखा मासा गळाला लागला तर झटपट श्रीमंत होण्याचे भाग्य तिला कवेत आल्यासारखे वाटले. या पार्टीसाठी खास तिने पार्लरमध्ये जाऊन हेअर स्टाईल करुन घेतली आणि नवीन ड्रेस विकत आणला.

‘‘ओह! यू आर लुकिंग मार्व्हलस,’’

मोहनच्या या वाक्याने मोनाच्या गालावर गुलाब उमलले. ती सर्व वेळ मोहनबरोबर पिंगा घालत होती. तो अनेक तरुणींशी बोलत हाता. थोडा थोडा वेळ नाचत होता. पण मोनाकडे अधिक लक्ष पुरवत होता. ‘नवीन पाखरू दिसतंय’ असं कोणीतरी म्हटल्याचं मोनाने ऐकलं, पण तिने तिकडे लक्ष दिलं नाही. कारण लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटत असल्याने तिने साफ दुर्लक्ष केलं. पार्टीत तिला शाळेतील एक मैत्रीण भेटली. आलिशान गाडीतून आली होती. तिच्या अंगावरील हिऱ्यांचे दागिने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  श्रीमंत नवरा मिळवण्यात ती यशस्वी झाली होती.

‘‘मोना आपण उद्या संध्याकाळी भेटूया का? मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मोना अर्थातच एका पायावर तयार होती. मोहनला हातचं गमवायला मोना तयार नव्हती. म्हणूनच उमेशने दिलेल्या इशाऱ्याकडे तिने स्पेशल दुर्लक्ष केलं.’’

दुसऱ्याच दिवशी दोघे भेटल्यावर मोहनने मोनासमोर आपला प्रस्ताव मांडला.

‘‘मोना, तू एक हुशार आर्किटेक्चर आहेस. इंटीरिअर डिझायनिंग करण्याची एक विशिष्ट दृष्टी तुझ्याकडे आहे. तेव्हा तू मला साथ दिलीस तर एक उत्तम प्रोजेक्ट आपण तयार करू शकू, एक फाइव्ह स्टार हॉटेल बांधण्याचे काम माझ्याकडे आले आहे. त्यासाठी आपण पॅरिसला जाऊ. तेथील हॉटेल्स तू नजरेखालून घाल व तुझे डिझाइन्स तयार कर. मी तुला उमेशपेक्षा चौपट पगार देईन.’’

नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. येनकेन प्रकारेण तिला श्रीमंत बनायचे होते. मोहनसारखा मासा तिच्या गळाला लागला होता. ती त्याला गमावू इच्छित नव्हती. ती त्याच्यासोबत खूप आनंदीत होती. एकमेकांच्या हातात हात गुंफुनच ते त्यांच्या रूममध्ये शिरले होते. पॅरिसच्या सौंदर्याने तिचे डोळे दिपून गेले होते. फ्रेश होऊन दोघेही खाली हॉलमध्ये आले. धुंद मधुर संगीतावर जोडप्यांनी हळूवार ताल धरला होता.

‘‘डार्लिंग, आज तू खूपच सुंदर दिसते आहेस.’’ मोहनच्या बोलण्यावर मोनाचे गाल आरक्त झाले होते. आज प्रथमच तिने मद्याची चव चाखली होती. स्वर्ग याहून वेगळा नसावा असे तिला वाटले.

इतक्यात रोझी नावाची सुंदर फ्रेंच तरुणी मोहनजवळ आली. पण मोहनने तिला ओळख दिली नाही. ‘बास्टर्ड,’ अशी शिवी देऊन ती तिथून निघून गेली. मोहनच्या जवळीकीने मोना फुलारली होती. आजचा चान्स घालवायचा नाही असं तिने मनोमन ठरवलं.

वर जाताना लिफ्टमध्ये दोन भारतीय तरुणींचं बोलणं तिच्या कानावर पडलं व ती चमकली.

‘‘श्रीमंत लोकांना मुली म्हणजे खेळणी वाटतात. खेळून मन भरले की फेकून देतात. लग्नाचे आमिष दाखवतात. लग्न मात्र त्यांच्याच पोझिशनच्या व खानदानी मुलीशी करतात.’’

आता मात्र मोना चांगलीच चमकली. विचारांचे काहूर तिच्या मनात माजले. आजीचे बोलणे पिंगा घालू लागले. आपले सर्वस्व अर्पण करूनही मोहनने आपल्याशी लग्न केले नाही तर आपली काय गत होईल. शीलाविषयी आपल्या कल्पना बुरसटलेल्या नसल्या तरी नंतर आपण ताठ मानेने जगू शकू काय? केवळ पैसाच आयुष्यात सर्व काही आहे का? तिला उमेशच वागणे, बोलणे आठवले. सोबत काम करत असूनही त्याने कधी तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्नही केला नाही. तिला नेहमीच आदराने वागवले. मित्रत्त्वाच्या नात्याने त्याने तिला मोहनपासून दूर राहण्याचा इशारासुद्धा दिला होता, पंरतु मोनाने त्याचं काहीएक ऐकलं नव्हतं.

आता मात्र तिला पुरती जाणीव झाली होती की तिने थोडी जास्तच उच्च स्वप्नं पाहायला सुरूवात केली होती. मोहन तिला पसंत करत होता, परंतु ती त्याच्या बरोबरीची नव्हती आणि त्यामुळे तो तिच्याशी विवाह करू शकणार नव्हता.

तिची आजी बरोबरच बोलत होती की मुलींनी आपल्या चारित्र्याची खूप काळजी घ्यायला हवी. मग तिने निर्णय घेतला की ती स्वत: उमेशसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवणार. ती मुंबईला परतण्यासाठी आतुर झाली होती. मोहनचा फोन आला, तेव्हा तिने त्याला सांगितलं की तिला बरं वाटत नाहीए. त्यामुळे ती थांबून विश्रांती घेणार आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें