गट एनआरआय

कथा * संध्या सिनकर

मासिक वाचताना मला एक छान लेख दिसला. ज्यांची मुलं परदेशात आहेत, त्यांच्या गटाविषयी माहिती. त्या लेखात मला गणेशचे नाव दिसले. गणेश माझा बँकेतला जुना सहकारी. मी लगेच गणेशला फोन केला. गणेशने सांगितलं , ‘‘तो पुण्याला एका लग्नाला गेला असताना त्याला पुण्यातील अशा गटाविषयी माहिती कळली. घरी आल्यावर त्याने त्याच्या मित्रांना फोन केले. काही दिवसातच हा गट तयार झाला. ज्याचं नाव सर्वांनी मिळून एकमताने ठरवलं ‘गट एनआरआय.’’’ तो पुढे म्हणाला, ‘‘आम्ही ललिताच्या घरी शुक्रवारी भेटणार आहोत. तेव्हा तू तिकडे ये. सगळयांना भेट. गप्पाही होतील व तुला माहितीही मिळेल. मी तुला पत्ता एसएमएस करतो.’’

मी ललिताच्या घरी पोहोचले तर सगळे जण जमले होते. स्वागत व ओळख होऊन मी सोफ्यावर विसावले. चमचमीत पदार्थांचा सुगंध दरवळत होता. गप्पांचा किलबिलाट आणि हास्याची कारंजी उसळत होती. खाद्यपदार्थांची रेलचेल होती. स्वातीने आपल्या ताटलीत थोडे छोटे बटाटे वडे आणि एक पिझाचा तुकडा वाढून घेतला आणि श्यामकडे वळत ती म्हणाली, ‘‘आपल्या गटाला एक वर्ष झालं वाटतच नाही ना?’’ श्यामने हसत-हसत मान डोलावली. ‘‘हो ना’’ ललिता माझ्याकडे वळून म्हणाली, ‘‘गणेशने पुढाकार घेतल्याने आमच्या सर्वांच्या सहभागाने हा ‘गट  एनआरआय’ तयार केला. मग आम्ही मानसशास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांना भेटलो. त्यांना या क्षेत्रातला खूप अनुभव आहे. त्यांच्या सूचना आणि एकंदर विचार करून आम्ही गटासाठी काही गोष्टी ठरवल्या. जशा की आठवडयातून एकदा एकाच्या घरी आाळी पाळीने भेटायचे. एकमेकांच्या आजारपणात/अडचणीत मदत करायची. दोन-तीन महिन्यांनी एक दोन दिवसाच्या सहलीचा कार्यक्रम करायचा. एकमेकांच्या संपर्कात राहायचे.’’

‘‘खरंच डिसेंबरमध्ये गणेशच्या डोळयाच्या शस्त्रक्रियेच्या वेळेला तुम्ही सगळे मदतीला होतात, त्यामुळे काहीच अडचण आली नाही,’’ निशा म्हणाली.

‘‘विद्या रस्त्यात धडपडली आणि पायात रॉड टाकायला लागला, तेव्हाही पाच दिवसाचं हॉस्पिटलचं वास्तव्य तुमच्या सगळयांमुळे खूपच सोपं गेलं. मुलांनाही बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही.’’ इति विजय.

‘‘खरंच आपलं कोणीतरी जवळ आहे. एक फोन केला की आपल्यासाठी चारजण धावत येऊ शकतात. या विचारानेसुद्धा अगदी निर्धास्त वाटतं आणि रात्रीची झोपही चांगली लागते.’’ निशा म्हणाली.

‘‘अरे फक्त गप्पा मारू नका .भरपूर फोटोही काढा. नेहमीप्रमाणे आपल्या वहीत रंगीत पेपर प्रिंट चिकटवयाची आहे. अर्थात फोटो निवडणे व चिकटवणे आणि मिटिंगचा गोषवारा लिहिणे हे काम अर्थातच  माझे.’’ विजयने ती वही मला दाखवली. भरपूर फोटो होते. १२ जणांचा ग्रुप.

गणेश व निशा

गणेश  बँकेतून निवृत्त व निशा निवृत्त शिक्षिका.

गणेशने सांगायला सुरूवात केली, ‘‘माझी मोठी मुलगी डेंटिस्ट आणि मुलगा संगणक अभियंता. दोन्ही मुलांनी बाहेरच्या देशात जायचे नाही असे ठरवले होते. त्याप्रमाणे घराजवळच मुलीसाठी प्रॅक्टिस करायला जागा शोधत होतो.

‘‘तेव्हा ती एका वरिष्ठ दंतवैद्याकडे अनुभव घेत होती. मुलगा पुण्याच्या एका मोठया संगणक कंपनीत नोकरीला लागला. आम्ही पुण्यात त्याच्यासाठी घर बघायला सुरूवात केली आणि आता मुलीच्या लग्नाच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू केले. स्थळ बघत असताना माझ्या मित्राच्या मुलाची माहिती कळली. तो संगणक अभियंता. अमेरिकेत वास्तव्य. चांगला पगार. घरचे सगळे परिचित. त्यामुळे मुलीला म्हटले बोलून तर बघ त्याच्याशी. ते दोघे भेटले. एकमेकांना पसंत केले आणि लग्न करून मुलगी अमेरिकेत गेली. मास्टर्स केले व काम करायला सुरुवात केली. मुलगी तिकडे गेल्यावर तिने भावाला तिकडच्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या चांगल्या संधीबद्दल माहिती दिली व त्याने अमेरिकेत जाण्याचे ठरवले. आमची काही आडकाठी अर्थातच नव्हती. आता तोही मास्टर्स करून नोकरी करत अमेरिकेत स्थिरावला आहे.’’

मीना व शैलेश

मीना औषध निर्माण महाविद्यालयातून निवृत्त प्राध्यापिका, शैलेश औषध निर्माण कंपनीतून निवृत्त.

मीनाच्या शब्दात सांगायचं तर दोन मुली. मोठ्या मुलीने औषध निर्माण शास्त्रामध्ये मास्टर्स केले. लग्न करून नवऱ्याबरोबर पीएचडीसाठी जर्मनीत गेली. आता दोघेही शिक्षण संपवून जर्मनीत कार्यरत. दुसरी मुलगी एमबीबीएस. थोडा अनुभव घेऊन आता पुढील शिक्षणासाठी जर्मनीत.

ललिता व वसंत

ललिता गृहिणी, तर वसंत खाजगी कंपनीतून निवृत्त.

ललिताने सांगितले की, ‘‘दोन मुले. एक मुलगा व एक मुलगी. दोघेही संगणक अभियंता. दोन्ही मुलं संगणक अभियंता झाल्यावर पुण्याला एका मोठया संगणक कंपनीमध्ये नोकरीला लागली. मुलीचे लग्नही पुण्याच्या एका संगणक अभियंत्याशी झाले. आम्ही तिघांनीही एकाच संकुलामध्ये वेगवेगळया सदनिका घेतल्या. दरम्यान मुलाला त्याच्या कंपनीने एका प्रोजेक्टवर अमेरिकेला पाठवले. तिकडचे वातावरण त्याला आवडले. मग वर्षभरानंतर सुट्टीत येऊन लग्न करून तो परत अमेरिकेला निघून गेला. नंतर तो नोकरी बदलून अमेरिकन कंपनीमध्ये रुजू झाला. दरम्यान मुलगी आणि जावईसुद्धा अमेरिकेत शिफ्ट झाले. मग आम्ही पुण्याचे घर बंद करून आमच्या ठाण्याच्या मूळ घरी परत आलो.

नीता व मंदार

नीता गृहिणी, मंदार एअर इंडियातून निवृत्त.

नीताच्या म्हणण्यानुसार एक मुलगा मेकॅनिकल इंजीनिअर. भारतात ४ वर्ष नोकरी केली. अधिक चांगली संधी मिळाल्यामुळे ७ वर्षापासून दुबईत नोकरी करतोय. सूनसुद्धा दुबईत नोकरी करते.

विद्या व विजय

दोघेही खाजगी कंपनीतून स्वेच्छा निवृत्त.

विद्याच्या शब्दात एकच मुलगा. त्याची डिफेंसमध्ये जायची इच्छा होती. पण दृष्टीतील किंचितशा कमतरतेमुळे निवड झाली नाही. आता हॉटेल मॅनेजमेंट केले व मास्टर्स करून कॅनडामध्ये कार्यरत.

स्वाती व श्याम

स्वाती गृहिणी व श्याम राज्य सरकारी नोकरीतून निवृत्त.

श्यामने सांगितलं, ‘‘दोन मुलगे. दोन्ही संगणक अभियंता, दोघेही मास्टर्स करून अमेरिकेत कार्यरत.

‘‘विजय तू खूप छान वही ठेवली आहेस. फोटो व थोडक्यात माहिती दोन्ही मस्त. हा गट तयार झाल्यामुळे तुमची मुलंसुद्धा खुश झाली असतील ना?’’ मी म्हटलं. ‘‘मुलं खूपच रिलॅक्स झाली.’’ निशा म्हणाली, ‘‘सगळया मुलांनी काका काकूंचे नंबर घेऊन ठेवले आहेत. त्यामुळे कोणाची शुगर वाढली तर त्याला ओरडण्यासाठी बाकी काका-काकूंना फोन करणे हे मुले लगेच करतात.’’

स्वाती म्हणाली, ‘‘यावेळी मी मुलांना सांगितलं की दरवर्षी सुट्टीत तुम्ही भारतात येता. यावेळी तुम्ही दुसरीकडे फिरून या.’’

गणेश म्हणाला, ‘‘आम्ही आता इकडच्या जवळच्या निवृत्त पेन्शनर्स असोसिएशनला जोडून घेतले आहे. त्यामुळे त्यांची आहार विषयक व्याख्याने किंवा डॉक्टरांच्या व्याख्यानांना आम्ही जमेल तसे जातो. तसंच आता आमचा  आठवडयातून एकदा योगा क्लास लावायचा किंवा योगाशिक्षकाला घरी बोलावून एकत्र योगा करण्याचा विचार आहे. गेले दोन महिने आम्ही महिन्यातून  एकदा पालीतील वृद्धाश्रमाला एक दिवस जातो. थोडी आर्थिक मदतही करतो. कर्जतच्या ‘शांतिनिकेतन अनाथाश्रमात’ धान्य पाठवतो.

आणखी ८ जणांना आमच्या गटात सामील व्हायचं आहे. पण आता आम्ही विचार करतोय की छोटे १०-१२ जणांचे वेगळे वेगळे गट करावेत व वर्षातून २-३ वेळेला सगळया गटाने एकत्र भेटावे.’’

तेवढयात कुणीतरी गाणं लावलं व बरीच पावलं थिरकायला लागली. सगळं वातावरण आनंद, उत्साह व  सकारात्मकतेने भरलेलं होतं. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेताना मला वाटलं की असे सारखी आवड जसे प्रवास, वाचन, पाकक्रिया, गाणे व वादन असलेल्यांचेही गट बनायला हवेत व सर्वांनी जीवनातील आनंद भरभरून लुटायला हवा.

घुसमट

कथा * पौर्णिमा अत्रे

पाच महिन्यांची सिया, शुभीची पहिलीच मुलगी. लाडक्या लेकीचे पुन्हा:पुन्हा लाड करून शुभीनं तिला खाली ठेवली. बाळंतपणाच्या दीर्घ रजेनंतर शुभी आज प्रथमच ऑफिसला निघाली होती. लहानग्या, गोंडस सियाला सोडून जावंसं वाटत नव्हतं, पण जायला हवंच होतं. गेले सहा महिने ती घरीच होती.

मयंकनं शुभीकडे बघितलं. ती पुन्हा:पुन्हा सियाला छातीशी कवटांळत होती.

‘‘काय झालं?’’ त्यानं विचारलं.

‘‘सियाला सोडून जावंसं वाटत नाहीए.’’

‘‘हो गं! मी समजू शकतो. पण तू काळजी करू नकोस. आईबाबा आहेत…शिवाय रमाबाई आहेच. सिया अगदी सुरक्षित वातावरणात आनंदात राहील. डोंट वरी…चल, निघायला हवं.’’

दिनेश आणि लता म्हणजे शुभीच्या सासूसासऱ्यांनीही तिला आश्वस्त केलं, ‘‘शुभी, अगदी नि:शंक मनानं जा. आम्ही आहोत ना? सिया मजेत राहील.’’

शुभी केविलवाणं हसली. सिया आजीच्या कडेवरून आईकडे बघत होती. शुभीचे डोळे भरून आले. पण ही वेळ भावनाविवश होण्याची नव्हती. तिनं पटकन पर्स उचलली अन् ती मयंकबरोबर घराबाहेर पडली.

शुभी अन् मयंक नवी मुंबईत राहत होती. तिथून आठ किलोमीटर अंतरावर शुभीचं ऑफिस होतं. मयंकनं तिला बस स्टॉपवर सोडलं अन् तो पुढे निघून गेला. बसमध्ये बसायला जागा नव्हती. उभ्याउभ्याच शुभी विचारात गढून गेली.

एका प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन कंपनीत शुभी एक्सपोर्ट मॅनेजर होती. पगार भरपूर होता. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती घरी, ऑफिसातही सर्वांना हवीशी वाटायची. आत्तापर्यंतचं तिचं आयुष्य खूपच निवांत अन् आनंदात गेलं होतं. पण आज सियाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच ऑफिसात आली होती, त्यामुळे ती जरा उदास होती.

ऑफिसात गेल्यावर शुभीनं सर्वत्र नजर फिरवली. बरेच नवे चेहरे दिसले. जुन्या लोकांनी तिचं अभिनंदन केलं अन् ते आपापल्या कामाला लागले. शुभी ज्या पोस्टवर होती तिथं जबाबदाऱ्या भरपूर होत्या. आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्ट तिच अप्रूव्ह करत होती.

शुभीची बॉस शिल्पी तिच्या कामावर खुश होती. कितीही काम असलं तरी शुभी हसतमुखानं सर्व कामाचा फडशा पाडायची. त्यामुळे शिल्पी आपलीही बरीचशी कामं शुभीवर टाकायची. शुभीनंही ती कामं आनंदाने केली होती.

शिल्पी खूपदा म्हणायची, ‘‘शुभी, तू नसतीस तर इतकं काम मी एकटी करू शकले नसते. तुझ्यावर सगळी कामं सोपवून मी अगदी निश्चिंत होते.’’

शुभीला आपल्या कर्तबगारीचा, योग्यतेचा गर्व वाटायचा. तशी शिल्पी बऱ्यापैकी खडूस अन् खवंट होती. पण अशा बॉसकडून कौतुक ऐकलं की शुभीचाही अहंकार सुखावत असे. आपल्या कामाव्यतिरिक्त इतरही अनेक कामं शुभी आटोपत असे.

ऑफिसात आपल्या सीटवर आल्या आल्याच शुभीला स्वत:त उर्जेचा संचार झाल्याचं जाणवलं. कर्तव्याची भावना मनातून उसळी मारून वर आली. शिल्पीला भेटून औपचारिक बोलणं झाल्यावर ती उत्साहानं कामाला लागली. महिनाभरातच एक नवा प्रॉडक्ट लाँच व्हायचा होता. त्याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी शुभी शिल्पीकडे गेली, तेव्हा अगदी थंडपणे ती म्हणाली, ‘‘शुभी, एक नवी मुलगी आली आहे, तिलाच हे असाइनमेंट दिलंय.’’

‘‘पण का? मी आलेय आता तर मी करते ना?’’

‘‘नको, तू राहू दे. बऱ्याच उशिरापर्यंत थांबावं लागेल…तुला तर आता घरी पोहोचण्याची घाई असणार ना?’’

‘‘नाही नाही, असं काही नाहीए…काम तर मी करणारच ना?’’

‘‘नको, तू राहू दे…’’

मनात खळकन् काही तरी फुटल्यासारखं वाटलं शुभीला. ती तर आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्टसाठी जिवाचं रान करत होती, तर आता का नाही करू शकणार काम? सियासाठी तिला घरी लवकर जावं लागेल हे खरं असलं तरी ती जमवून घेईल सगळं. तिच्या मानसिक समाधानासाठी, मानसिक आनंदासाठीच तर ती नोकरी करतेय ना? काही न बोलता ती परत टेबलपाशी आली, पण मघाचा उत्साह, उर्जा आता लोप पावली होती.

तिनं ऑफिसात सर्वत्र नजर फिरवली. तिला एकदम कपिलची आठवण आली. कपिल कुठाय? सकाळपासून दिसलाही नाहीए. त्याच्या आठवणीनं तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मोकळ्या ढाकळ्या विनोदी स्वभावाचा कपिल सतत तिच्याशी चेष्टा मस्करी करायचा. फ्लर्टिंगच म्हणा ना. शुभीला गंमत वाटायची. ती विवाहित होती. त्यातून गरोदर होती, तरीही कपिल तिच्या मागेपुढे करायचा. कपिल तिला एकदम लंच टाइममध्ये भेटला. आज तिनं आपला डबा घरून आणला नव्हता. कॅन्टीनमध्ये जेवावं असं ठरलं होतं. उद्यापासून डबा आणता येईल. ती कॅन्टीनकडे निघाली. तेवढ्यात तिला कपिल दिसला. तिनं हाक मारली,

‘‘कपिल…’’

‘‘अरेच्चा? तू? कशी आहेस?’’

‘‘छान आहे. सकाळपासून दिसला नाहीस?’’

‘‘हो…फिल्डवर होतो. एवढ्यात येतोय.’’

‘‘आणि कसं काय?’’

‘‘छान आहे. तुझी मुलगी कशी आहे?’’

‘‘मस्त आहे, चल, लंच घेऊयात.’’

‘‘हो तू हो पुढे, मी येतोच,’’ म्हणत कपिल दुसरीकडे निघून गेला.

शुभीला नवलच वाटलं? हा तोच कपिल का? इतका फॉर्मल? असा तर तो कधीच वागत नसे. शुभीनं तिच्या जुन्या सहकाऱ्यांबरोबर जेवण उरकलं, सहज लक्ष गेलं तर कपिल एका नव्या ग्रुपसोबत खिदळत होता. तिनं एक नि:श्वास सोडला. घरी फोन करून सासूला सियाबद्दल विचारलं. सगळं ठीक आहे कळल्यावर ती पुन्हा आपल्या टेबलपाशी येऊन कामाला लागली.

संध्याकाळी सहाला शुभी ऑफिसमधून निघून बस स्टॅन्डवर पोहोचली. एरवी इतक्या लवकर ती कधीच निघत नव्हती. कामंच आटोपत नव्हती. आज कामच कमी होतं. ती विचार करत होती. इतक्या दिवसांनी कामावर आल्यावर ऑफिसात चित्त का लागत नव्हतं. कदाचित सियाला पहिल्यांदाच इतका वेळ सोडून आल्यामुळे असेल का? की ऑफिसात बरेच बदल झालेत. नवी माणसं आली आहेत म्हणून? पूर्वी तिला कपिलचं फ्लर्ट करणं आवडायचं. छान टाइमपास होता तो. तिला वाटत होतं, इतक्या दिवसांनी कपिल भेटेल तेव्हा खूप गप्पा मारेल, बडबड करेल, तिला कामही सुचू देणार नाही. पण आज तर त्यानं शुभीला चक्क टाळलंच. ती रजेवर गेल्यानंतर सुरूवातीला तो आवर्जून फोन करायचा. पुढे पुढे मेसेजना रिप्लायसुद्धा देणं बंद केलं होतं. ती ही बाळात गुंतली. आत्ताच्या नव्या प्रॉडक्टमध्ये तिला इंटरेस्ट होता पण शिल्पीशी वाद कुणी घालायचा.

ती घरी पोहोचली, तेव्हा सियाला सांभाळताना सासू सासऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली होती. शुभीनं सिया म्हणून हाक मारताच सिया आईकडे झेपावली. शुभीनं भराभर हातपाय तोंड धुवून कपडे बदलून सियाला जवळ घेतलं. तिला छातीशी कवटाळून ती आपल्या बेडरूममध्ये येऊन अंथरूणावर पडली. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

सासू खोलीत आली. ‘‘कसा गेला दिवस?’’

‘‘सियानं त्रास नाही ना दिला?’’ शुभीनं विचारलं.

‘‘रडली थोडीशी, पण हळूहळू होईल तिला सवय. तिला, आम्हाला अन् तुलाही, कारण तुझं ऑफिसला जाणंही गरजेचं आहे ना?’’ सासू म्हणाली.

एव्हाना मयंकही आला होता. रमाबाई सायंकाळचा स्वयंपाक आटोपून निघून गेल्या होत्या. रात्रीची जेवणं एकत्रच झाली. सिया सर्व वेळ आईला चिकटूनच होती.

मयंकनं विचारलं, ‘‘शुभी, आज खूप दिवसांनी ऑफिसला गेली होतीस, कसा गेला दिवस?’’

‘‘वातावरण खूपच बदलेलं वाटलं. खूप नवीन लोकही आले आहेत. आज काही माझं चित्त लागेना कामात?’’

‘‘कदाचित तुला सतत सियाची आठवण येत असेल…होईल हळूहळू सवय.’’

त्या नंतरच्या पंधरा वीस दिवसांत ऑफिसचे झालेले एकूण बदल लक्षात आल्यावर शुभीला टेन्शनच आलं. हा प्रकार नवा होता. शिल्पी तशीही चिडचिडी होती. नवरा बंगळुरूला जॉब करत होता. ही मुंबईत एकटीच असायची. पंधरा दिवसांनी एकदा नवरा मुंबईत यायचा. त्यामुळे तिला बंधनं काहीच नव्हती. नेमकी सायंकाळी सहा वाजता तिला मीटिंग घेण्याची हुक्की यायची. अत्यंत महत्त्वाची डिस्कशन्स तिला नेमकी साडेसहाला आठवायची. मग सात वाजता मीटिंग व्हायची.

शुभीला आपलं काम आवडायचं. प्रामाणिकपणे ती काम करायची. जास्तीच्या कामाबद्दलही कधी तिनं तक्रार केली नव्हती. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शुभीनं इथवर पोहोचायला खूप श्रम घेतले होते. सहाच्या सुमाराला शुभीनं तिच्या नव्या सहकारी मैत्रिणीला घरी विचारलं तर ती म्हणाली, ‘‘आता तर मीटिंग आहे ना?’’

शुभी दचकलीच! ‘‘मीटिंग कुणी ठेवलीय? मला तर काहीच ठाऊक नव्हतं.’’

वैतागून हेमानं म्हटलं, ‘‘शिल्पीनं बोलावलीय. तिला स्वत:ला घरी जाण्याची कधीच घाई नसते. पण इतरांना घरदार, मुलं, नवरा, कुटुंब सांभाळायचं असतं हे ती लक्षातच घेत नाही.’’

शुभीला जरा गोंधळल्यासारखं झालं…शेवटी न राहवून ती शिल्पीकडे पोहोचली, ‘‘मॅम, मला माटिंगबद्दल ठाऊकच नव्हतं. काय डिस्कस करायचंय? मी काही तयारी करू?’’

‘‘नको, तू राहू दे. एका नव्या असाइनमेंटवर काम करायचंय.’’

‘‘मग मी थांबू का?’’

‘‘नाही…नको, तू घरी जा.’’ लॅपटॉपवरची नजरही न काढता शिल्पी आपलं काम करत राहिली. शुभीला ती उपेक्षा, तो अपमान खूपच खटकला. त्याच मन:स्थितीत ती घरी आली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिला मनातल्या भावना मोकळ्या कराव्याशा वाटल्या. तिनं म्हटलं, ‘‘मयंक, हल्ली ऑफिसात वातावरण विचित्र आहे. मला तिथं घुसमटायला होतंय. पूर्वी माझ्या खेरीज शिल्पीच्या मीटिंग्ज होत नव्हत्या. आता तिला माझी गरजच नाहीए. मला नवी असाइनमेंटही देत नाहीए.’’

कुणी काहीच बोललं नाही, तेव्हा तिच पुढे म्हणाली, ‘‘पूर्वी जे लोक सतत मागेपुढे करायचे, ते ही आता टाळायला बघतात. मला अजिबात आवडत नाहीए तिथं काम करायला. सियाच्या जन्मानंतर मी ऑफिस जॉइन करून चूक केली असं वाटतंय मला. घुसमट सहन होत नाहीए. जीव गुदमरतोय जणू…’’

मयंकनं तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं अन् तो म्हणाला, ‘‘टेकइट ईझी शुभी, तुला कदाचित फार दिवसांनी गेल्यामुळे असं वाटत असेल…पण नोकरी तर करायचीच आहे ना?’’

‘‘नाही, मला नाही जावंसं वाटत…’’

‘‘असं कसं? जावं तर लागेलंच!’’

आता सासूलाही संभाषणांत भाग घ्यावासा वाटला, ‘‘अगं, पण घरात इतके खर्च आहेत, दोघं कमवता आहात म्हणून सगळं सुरळीत चाललंय. एकट्या मयंकाच्या पगारात असं सगळं होईल का?’’

शुभी गप्प बसली. तिलाही माहीत होतं की तिला मिळणाऱ्या दणदणीत पगारामुळेच त्यांचं स्टॅन्डर्ड इतकं ‘हाय’ आहे. स्वत:च्या पायावर उभं असण्याचा तिलाही अभिमान होताच. पण ऑफिसात खरंच तिला घुसमटायला होतंय. नाहीच जावंस वाटत. तिला वाटतंय सध्या ब्रेक घ्यावा. घरीच सियाबरोबर रहावं…पण ब्रेक घेतल्यामुळेच तर सगळं बदललं आहे. सासूसासरे, मयंक सगळेच आपापल्या परीनं तिला समजवंत होते. काही तिला समजलं, काही तिनं समजून घेतलं नाही…ती स्वत:च्याच मनाची समजूत घालत होती.

काही दिवस अजून गेले. सिया आता नऊ महिन्यांची झाली होती. खूपच शांत अन् खेळकर होती सिया. दिवसभर ती आईशिवाय छान राहायची. संध्याकाळी मात्र आई आल्यावर आईला अजिबात सोडत नसे.

शुभीला आता ऑफिसच्या कामात मजा येत नव्हती. शिल्पी आता तिला अजिबात विचारत नव्हती. नवी जबाबदारी देणं तर दूरची गोष्ट होती. सहा महिन्यांत इतका फरक का पडावा हेच तिला कळत नव्हतं. कुठं काय चुकलं? तिनं बाळंतपणाची रजाच घ्यायला नको होती का? पण तो तर तिचा हक्कच होता. पण तेवढ्यामुळे ऑफिसमधली तिची गरजच संपून जावी?

त्यातून पुन्हा कपिलचं तुसडेपणानं वागणं, त्याच्याकडून होणारी उपेक्षा तिला अधिकच दु:खी करत होती. ती एका बाळाची आई झाल्यामुळे त्याच्या स्वभावात इतका फरक पडावा? कधी तरी भेटला तर इतका औपचारिकपणे बोलायचा, वागायचा, जणू हा तो कपिल नाहीच. पूर्वी त्याचे रोमँटिक डॉयलॉग, फ्लर्टिंग, जोक्स ती एन्जॉय करायची. दिवसा कसा उत्साहानं सळसळत संपायचा. आता मात्र ती उदास कंटाळवाणा दिवस कसाबसा रेटून घरी परतायची.

आपली योग्यता, आपल्या अधिकाराच्या अनुरूप काम ऑफिसात दिलं जात नाही यामुळे ती निराश असायची. टेन्शन यायचं तिला. मनाची घुसमट वाढत होती. घरात कुणीच तिला समजून घेत नव्हतं अन् ऑफिसमध्ये मनाजोगतं काम मिळत नव्हतं.

नेमकं तिच्या मागे काय घडलं होतं ते तिला समजलं नाही. पण ऑफिसात वातावरण बदललं होतं. त्यामुळे ती फार त्रस्त होती. ती घुसमट, तो ताण सहन होईना. डिप्रेशन येईल की काय असं वाटत होतं. शेवटी तिनं सरळ राजीनामा लिहिला अन् शिल्पीकडे पाठवला. तिला नवल वाटलं…कुणीच काही रिएक्शन दिली नाही. ती ऑफिसबाहेर पडली अन् तिनं मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला.

थोड्या दिवसांनी दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न करता येतील. तिच्याजवळ योग्यता आहे. वय अजून गेलेलं नाही. ती मेहनती आहे. दुसरी नोकरी सहज मिळेल. सध्या तरी सियाबरोबर वेळ घालवता येईल. इतकी वर्षं इथं मरेमरेतो काम केलं. रात्र की दिवस बघितला नाही, तिथंच तिला इतकं इग्नोर करताहेत. नकोच ती नोकरी.

खूपच दिवसांनी ती त्या दिवशी आनंदी अन् शांत मन:स्थितीत होती. घरी परतताना तिनं सियासाठी खेळणी अन् फ्रॉक्स विकत घेतले. घरी पोहोचताच सिया तिच्याकडे झेपावली. सियाला जवळ घेतल्यावर तिला अजूनच छान वाटलं. रात्री जेवताना तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मी आज राजीनामा दिला.’’

सगळ्यांना जणू विजेचा शॉक बसला. सगळ्यांनी एकदमच विचारलं, ‘‘का?’’

‘‘मला तिथलं टेंशन सहन होईना. ते वातावरण डिप्रेशन आणणारं होतं. मी दुसरी नोकरी शोधेन. मला तिथं आवडत नव्हतं.’’

मयंक चिडचिडून म्हणाला, ‘‘हा काय मूर्खपणा आहे? तिथं नोकरी करायची, वातावरण आवडत नाही याला काय अर्थ आहे?’’

‘‘नोकरीच करत होते, पण मला माझ्या योग्यतेप्रमाणे काम दिलं जात नाही. काम करण्याचं मानसिक समाधान नाही. त्यामुळे मला तिथं आवडत नव्हतं…’’

‘‘पण आधी दुसरा जॉब बघायचा. मग हा सोडायचा.’’

‘‘मी बघणारच आहे. माझ्याकडे योग्यता आहे, अनुभव आहे, वयही गेलेलं नाहीए.’’

सासू रागातच होती. म्हणाली, ‘‘दुसऱ्या जॉबमध्ये मन रमेल याची काय गॅरेंटी आहे? आणि मन लागत नाही हे काय नोकरी सोडायचं कारण असतं का? आता मयंकच्या एका पगारात कसं भागायचं? इतकी घाई का केलीस तू नोकरी सोडायची? थोडा धीर धरला असता…’’

सासरेही म्हणाले, ‘‘आता कधी नोकरी शोधणार, कधी मिळणार, कधी पगार येणार…इतके खर्च आहेत. एका पगारात काय काय होणार? कठीणच आहे…’’

सियाला मांडीवर घेऊन बसलेली शुभी त्या तिघांकडे आळीपाळीनं बघत होती. तिच्या मनाची घुसमट, तिचा होणारा कोंडमारा कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. तिची व्यथा, वेदना यापेक्षाही तिचा पगार थांबला हे महत्त्वांचं होतं…बिचारी शुभी…तिची घुसमट आता अधिकच वाढली होती.

विरंगुळा

कथा * लता सोनावणे

सकाळचे नऊ वाजले होते. नंदिनीनं नवऱ्याला अन् सोनी, राहुल या मुलांना हाक मारली, ‘‘ब्रेकफास्ट तयार आहे. लवकर या.’’

टेबलवर ब्रेकफास्ट मांडून नंदिनीनं त्यांचे डबे भरायला घेतले. दुपारच्या जेवणाचे डबे बरोबर घेऊनच तिघं सकाळी घराबाहेर पडायची. ती सरळ सायंकाळी परत यायची. बिपिन नाश्ता करता करता पेपर डोळ्याखालून घालत होते. सोनी अन् राहुल आपापल्या मोबाइलमध्ये गर्क होते. या तिघांचं आटोपून ती निघून गेल्यावरच नंदिनी स्वत: ब्रेकफास्ट घेते.

मुलांना मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेलं बघितलं अन् नंदिनीचा पारा चढला, ‘‘जरा हसतबोलत नाश्ता करता येत नाही का? सगळा वेळ घराबाहेर असता, थोडा वेळ तरी तो मोबाइल बाजूला ठेवा ना?’’

बिपिनला तिचा उंच स्वर खटकला. कपाळाला आठ्या घालून म्हणाले, ‘‘का सकाळी सकाळी आरडा ओरडा करतेस? करत असतील काही त्यांच्या कामाचं.’’

नंदिनी पुन्हा करवादली, ‘‘आता तुम्ही तिघंही एकदम सांयकाळी याल. जरा मोबाइल बाजूला ठेवून चवीनं हसत बोलत खायला काय हरकत आहे?’’

बिपिन हसून म्हणाले, ‘‘खरं तर आम्ही शांतपणे खातोय अन् आरडाओरडा तू करते आहेस.’’

मुलांना बापाचं हे वाक्य फारच आवडलं, ‘‘बाबा, काय छान बोललात.’’ मुलांनी एकदम म्हटलं.

नंदिनीनं तिघांचे डबे अन् पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवल्या अन् ती उदास मनानं तिथून बाजूला झाली. आता सायंकाळपर्यंत ती घरात एकटीच होती. सकाळच्या जो थोडा वेळ हे लोक घरात असतात, त्यात नंदिनीशी थोडं बोलावं, तिची विचारपूस करावी असं यांना का वाटत नाही? सायंकाळी थकून येतील, मग टीव्हीसमोर पाय पसरून बसतील. फार तर फोन, लॅपटॉप…जेवतील की झोपले. आपसातला संवादच संपलाय. मुलं लहान असताना घरात कसं चैतन्य असे. पण ती मोठी झाली, मोबाइल, आयफोन वगैरे आले अन् घर अगदी भकास झालं. घरातल्या बाईलाही इतर सदस्यांनी तिच्याशी बोलावं, काही शाब्दिक देवाण घेवाण करावी असं वाटतं हे यांना का कळू नये?

मुलांना अन् नवऱ्याला वाटतं तिनं सोशल नेटवर्किंग करावं, शेजारीपाजारी ओळखी वाढवाव्यात, व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करावेत. पण हे सगळं नंदिनीला आवडत नाही, त्याला ती तरी काय करणार? नवऱ्याला अन् मुलांना फेसबुक मित्रांची सगळी बित्तंबातमी असते. पण घरात आईशी दोन शब्द बोलायला वेळ नसतो.

नंदिनीला फारच उदास वाटलं. तिघंही आपापले टिफिन बॉक्स घेऊन निघून गेले. तिनं स्वत:चा ब्रेकफास्ट उरकला. मोलकरीण येऊन कामं करून गेली. नंदिनीनं अंघोळ आटोपून रोजची जुजबी कामं उरकली.

पूर्वीही ती फार सोशल नव्हती. पण घरातच किती आनंद होता…तीही सतत हसायची. गाणी गुणगुणायची. आता दिवस कंटाळवाणा वाटतो. संध्याकाळ तर अधिकच रटाळ वाटते. उगीचच टीव्हीसमोर बसून वेळ काढायचा.

तिच्या घरातली बाल्कनी ही तिची फार आवडती जागा होती. लखनौहून मुंबईला येऊन तिला एक वर्षच झालं होतं. दादरसारख्या मध्यवस्तीत त्यांना सुंदर फ्लॅट मिळाला होता. मुलांना कॉलेज आणि बिपिनला ऑफिसला जाणंही इथून सोयीचं होतं.

बाल्कनीत तिनं लावलेली रातराणी आता सुरेख वाढली होती. इतरही काही झाडं छान फोफावली होती. हा हिरवागार कोपरा तिला खूप सुखावायचा. इथं तिचं एकटीचं राज्य होतं. इतर कुणी इकडे फिरकत नसे.

तेवढ्यात तिला आठवलं, बरेच दिवसात स्टोअररूममध्ये ती फिरकली नव्हती. ती स्टोअररूममध्ये गेली. थोडी आवराआवरी करताना तिला मुलांच्या खेळण्यांचा कागदी डबा हाती लागला. त्यात एक दुर्बिण किंवा बायनॉक्युलरसारखं खेळणं होतं. नैनीतालला गेले असताना मुलांनी हट्ट करून ते विकत घ्यायला लावलं होतं. आता मुलं मोठी झाल्यावरही ते त्यांच्या सामानात होतंच.

तिनं ती दुर्बिण हातात घेतली अन् गंमत म्हणून ती डोळ्याला लावून बघू लागली…लगेच ती बाल्कनीत आली. झाडांच्या आडोशात स्टुलावर बसून तिनं दुर्बिण फोकस केली अन् डोळ्याला लावून बघायला लागली. थोड्याच अंतरावर एका बिल्डिगचं बांधकाम सुरू होतं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये लोक राहायला आलेले होते. तिनं दुर्बिण थोडी फिरवली. समोरच्या घरातली बाल्कनी अन् त्याला लागून असलेली ड्रॉइंगरूम छान दिसत होती. ड्रॉइंगरूममध्ये एक मध्यमवयीन स्त्री डान्सच्या स्टेप करत कामं उरकत होती. बहुधा गाणं सुरू असावं.

तेवढ्यात तिची तरूण मुलगीही तिथं आली. आता मायलेकी दोघीही डान्स करू लागल्या. नंतर दोघीही खळखळून हसल्या अन् आतल्या खोलीत निघून गेल्या.

त्यांचं ते बिनधास्त नाचणं, खळखळून हसणं यामुळे नंदिनीचाही मूड एकदम छान झाला. तिच्या नकळत ती काही तरी गुणगुणु लागली. मग तिनं दुर्बिण इकडे तिकडे फिरवून पाहिली, पण बहुतेक फ्लॅट्स बंद होते किंवा त्यांचे पडदे ओढलेले होते.

अवचित तिची नजर एका फ्लॅटच्या बाल्कनीत स्थिरावली. ती दचकली. दुर्बिण हातातून पडता पडता वाचली.

एक बळकट, घोटील देहाचा तरूण बाल्कनीत टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत उभा होता. दुसऱ्या टॉवेलनं तो केस पुसत होता. तेवढ्यात त्याची तरूण नवविवाहित सुंदर पत्नी मागून येऊन त्याला बिलगली. वळून त्यानं तिला कवेत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् कंबरेत हात घालून तिला घेऊन तो ड्रॉइंगरूमच्या सोफ्यावर रेळून बसला. दोघंही एकमेकांची चुंबनं घेत होती. ती बेभान होती. बघताना नंदिनीचीही कानशिलं गरम झाली. हृदयाची धडधड वाढली. अंगावर गोड रोमांच उभे राहिले. किती तरी दिवसांनी शरीर अन् मन असं टवटवीत झाल्यासारखं वाटलं. काही क्षणांतच ते जोडपं आतल्या खोलीत निघून गेलं. बहुधा बेडरूममध्ये गेले असावेत, नंदिनीला हसायला आलं.

नंदिनी उठून घरात आली. एक वाजून गेला होता. वेळ इतका भर्रकन गेला होता. छान वाटत होतं. नंदिनी जेवतानाही प्रसन्न होती. तिला आपला लग्नातला शालू आठवला, हिरवा चुडा आठवला. छान नटून थटून बिपिनबरोबर फिरायला जावं असं वाटू लागलं.

जेवण आटोपून ती थोडा वेळ आडवी झाली. छानपैकी डुलकी झाली.

बारीकसारीक कामं आटोपून तिनं चहा केला. चहाचा कप अन् दुर्बिण घेऊन ती पुन्हा बाल्कनीत येऊन बसली. मायलेकींच्या घरात तर शांतता होती पण नवविवाहित जोडप्याची मात्र लगबग सुरू होती. खूप हौसेनं अन् उत्साहानं ती दोघं घर लावत होती. नवं लग्न, नवा संसार, नवं घर मांडताना त्यांचा प्रणयही रंगत होता. जोडी फारच छान होती.

नंदिनीनं हसून तिच्या बायनाक्युलरचा मुका घेतला. आज तिला एक नवीनच उत्साह वाटत होता. सगळा दिवस किती आनंदात गेला होता. गंमत म्हणजे आज तिला नवऱ्याचा किंवा मुलांचा राग आला नाही. कुठल्या जुन्या दुखवणाऱ्या घटना आठवल्या नाहीत. एकदम प्रसन्न होतं मन.

पाच वाजले. रोज सायंकाळी नंदिनी तासभर फिरायला जाते. तिनं कुठलंसं गाणं गुणगुणत स्वत:चं आवरलं अन् ती फिरायला निघाली. आज तिची चालही झपाझप होती. आपली ही दुर्बिणीची गंमत कुणालाही सांगायची नाही हे तिनं मनोमन ठरवलं होतं.

खरं तर असं चोरून बघणं बरोबर नाही, पण आजचा दिवस किती छान गेला. जाऊ दे, उगीच काय चूक काय बरोबर याचा विचार करायचाच नाही. ती फिरून आली आणि तिनं सर्वांसाठी संध्याकाळचा नाश्ता तयार केला. घरातली मंडळी येण्यापूर्वीच तिनं तिचं खेळणं कपाटात लपवून ठेवलं.

सायंकाळी घरी आलेल्या लोकांचा चहा फराळ आटोपून ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. अधूनमधून मुलांशी कॉलेजबद्दल बोलत होती. फोनवर गर्क असलेल्या राहुलला तिनं काहीतरी विचारलं, तसा एकदम तो खेकसला, ‘‘किती प्रश्न करतेस गं आई?’’

नंदिनीला आज त्याचा अजिबात राग आला नाही की वाईटही वाटलं नाही. तिला स्वत:लाच या गोष्टींचं नवल वाटलं. ती मजेत गाणं गुणगुणत काम करत होती.

जेवण झाल्यावर मुलं आपापल्या खोल्यांमधून गेली अन् बिपिन न्यूज बघू लागले. नंदिनीला वाटलं आपण आपली दुर्बिण घेऊन बाल्कनीत बसावं का? पण नकोच. घरात कुणाला काहीच कळायला नकोय. मग तिनं अत्यंत रोमँटिक पद्धतीनं बिपिनच्या गळ्यात हात घातले अन् विचारलं, ‘‘बाहेर थोडे पाय मोकळे करून येऊयात का?’’

बिपिन एकदम दचकलाच! तिच्याकडे लक्षपूर्वक बघत त्यानं विचारलं, ‘‘तुला काय झालंय?’’

हसून नंदिनीनं म्हटलं, ‘‘फक्त एवढंच नेहमी विचारता…दुसरं काही तरी बोला ना?’’

बिपिनलाही हसायला आलं. त्यांनी टीव्ही बंद केला. दोघं फिरून आली. नंदिनीचा मूड फारच छान होता. त्या नवविवाहित जोडप्याच्या प्रणयलीला आठवून ती ही उत्तेजित झाली होती. त्या रात्री कितीतरी दिवसांनी तिनं बिपिनच्या प्रेमाला मनापासून प्रतिसाद दिला.

सकाळी घरातली तिन्ही माणसं बाहेर जाताच नंदिनी ‘खेळणं’ घेऊन स्टुलावर येऊन बसली. मायलेकींच्या फ्लॅटमधली आई बहुधा नोकरी करत असावी. ती साडी नेसून तयार होती. मुलगी कॉलेजमधली असावी. दोघीही आपापलं आवरून एकत्रच बाहेर पडल्या. घरात इतर कुणी नसावं. काल बहुधा त्यांनी रजा घेतली असावी, तरीच नाचगाणं करू शकल्या. आत्ताही दोघी एकदम आनंदात अन् टवटवीत दिसत होत्या.

मग नंदिनीनं दुर्बिण दुसऱ्या फ्लॅटकडे वळवली, बघूयात राघूमैना काय करताहेत? तिला स्वत:च्या विचारांची गंमत वाटून ती मोठ्यानं हसली. राघू ऑफिससाठी तयार झाला होता. मैना त्याला स्वत:च्या हातानं सँडविच भरवत होती. व्वा! काय छान रोमांस चाललाय…खरंय, हेच दिवस असतात आयुष्य उपभोगायचे. नव्या नवलाईचे हे नऊ दिवस संपले की रटाळ आयुष्य सुरू होतं. तिला पुन्हा हसायला आलं. तेवढ्यात मोलकरीण आली. चपळाईनं नंदिनीनं दुर्बिण लपवली.

कितीतरी वर्षांनी नंदिनीनं बिपिनला मेसेज केला. ‘आय लव्ह यू’ बिपिननं आश्चर्य व्यक्त करणारी स्माइली पाठवत उत्तर दिलं, ‘आय लव्ह यू, डियर.’ नंदिनी अगदी वेगळ्याच मूडमध्ये घरातली कामं आवरत होती. दुपारी ती ब्यूटीपार्लरला गेली. फेशियल, मेनिक्योर, पॅडीक्योर, छानसा मॉडर्न हेअरकट करून घेतल्यावर आरशात स्वत:चं रूप बघून एकदम खुष झाली. तिथून ती मॉलमध्ये गेली. स्वत:साठी सुंदर कुर्ता विकत घेतला.

घरी परत येताच दुर्बिण उचलून बाल्कनी गाठली. मायलेकी बहुधा एकदम सायंकाळीच परतत असाव्यात. नवी नवरी एकदा ओझरती तिच्या बाल्कनीत दिसली अन् मग एकदम संध्याकाळी छान नटून थटून नवऱ्याची वाट बघत बाल्कनीत उभी होती. नंदिनीही आज एकदम वेगळ्याच पद्धतीने तयार झाली.

सायंकाळी सोनी, राहुल घरी परतले अन् नंदिनीला बघून सोनीनं म्हटलं, ‘‘व्वा, आई, किती छान दिसते आहेस. हा नवा हेअरकट खूप शोभून दिसतो आहे तुला.’’

राहुलनंही हसऱ्या चेहऱ्यानं म्हटलं, ‘‘अशीच राहत जा आई, लुकिंग गुड!’’

बिपिन घरी आले. ते तर कालपासूनच नंदिनीत झालेल्या बदलामुळे चकित झाले होते. वरपासून खालपर्यंत तिच्याकडे बघितल्यावर म्हणाले, ‘‘व्वा! फारच छान! काय, काही खास बेत आहे का?’’

नंदिनीनं हसून म्हटलं, ‘‘वाटलं तर तसं समजा.’’

‘‘चला तर, आजच्या या मेकओव्हर प्रित्यर्थ आपण आईस्क्रिम खाऊयात. रात्रीच्या जेवणानंतर ‘कूल कॅम्प’ला जाऊ.’’ बिपिननं म्हटलं, तशी दोघं ही मुलं आनंदानं चित्कारली.

‘‘व्वा! बाबा, किती मज्जा.’’

चौघंही आनंदात आईस्क्रीम खाऊन गप्पा मारत घरी पोहोचले. नंदिनीला स्वत:चंच आश्चर्य वाटत होतं. गेले दोन दिवस तिला कशाचाही राग आला नव्हता. सगळंच छान वाटत होतं. ती आनंदात असल्यामुळे घरातलंही वातावरण मोकळं आणि आनंदी होतं…म्हणजे, तिच्या तक्रारी व चिडचिडीमुळे घरातलं वातावरण बिघडतं? स्वत:च्या आयुष्यात आलेल्या नीरसपणाला ती स्वत:च जबाबदार होती का?

रिकामपण तिच्याजवळ होतं. इतरांना त्यांचे व्याप होते. त्या रिकामपणामुळे ती चिडचिडी बनली होती, आपला वेळ अन् एनर्जी तिघांबद्दल तक्रारी करण्यात खर्च करत होती. खरं तर आनंदी राहण्यासाठी तिनं कुणावर अवलंबून का असावं?

आता नंदिनीचं हेच रूटीन झालं. आपली बाल्कनी ती अधिक छान ठेवू लागली. रातराणी, मोगऱ्याच्या सुवासात, फांद्या अन् पानांच्या आडोशाच्या आधारानं स्टुलावर बसून दुर्बिण डोळ्याला लावायची अन् समोरच्या घरातली मजा बघायची. त्या हिरोहिरोइनच्या मादक प्रणयाची ती अबोल साक्षीदार होती. त्यांच्यामुळेच तिला स्वत:चे लग्न झाल्यानंतरचे प्रेमाचे दिवस आठवले. ती अन् बिपिन तेव्हा याच वयाचे होते.marathi-storyत्या दिवसांचा ताजेपणा आता तिला नव्यानं जाणवत होता. बिपिन टूरवर गेले तरी ती आता चिडचिड करत नव्हती. कधी मुलीबरोबर सिनेमा बघून यायची, कधी दोन्ही मुलांबरोबर त्यांच्या सोयीनुसार लंच किंवा डिनरला जायची. स्वत:च्या राहणीबद्दल अधिक सजग झाली होती. दैनंदिन कामाच्या जोडीनं व्यायमावरही लक्ष देत होती.

मायलेंकीच्या फ्लॅटमधल्या त्या दोघीही घाई गडबडीच्या आयुष्यात कायम आनंदी दिसायच्या. त्यांचा आनंद तिला सुखावत होता. ती मनातल्या मनात अंदाज बांधायची. या दोघीच का राहतात? यांच्या घरात अजून कुणी का नाही? आई विधवा असेल की घटस्फोटिता? मुलगी विवाहित आहे की अविवाहित? नंदिनीचा दिवस लवकर संपायचा. शिवाय, दुर्बिण लपवून ठेवणं आपलं गुपित आपल्यापुरंतच ठेवणं हीसुद्धा एक मज्जाच होती.

समोरच्या बिल्डिंगमधले इतर फ्लॅट्सही आता भरायला लागले होते. तिथली वस्ती वाढत होती. दुर्बिणीचा खेळ सुरू होऊन आता जवळपास सहा महिने लोटले होते. हिरोहिरोइनच्या रोमांसने तर तिच्या आयुष्यात नवं चैतन्य निर्माण केलं होतं. ती किती बदलली होती.

नेहमीप्रमाणे तिनं सकाळी आपली जागा धरून, बाल्कनीत बसून दुर्बिण डोळ्याला लावली अन् तिला धक्काच बसला. तिच्या हाताला कंप सुटला. स्वप्नांच्या जगातून वास्तवाच्या जमिनीवर दाणकन् आदळावं असं झालं. तिचे हिरोहिरोईन फ्लॅट रिकामा करण्याच्या लगबगीत होते. खाली रस्त्यावर ट्रकही उभा दिसला. हिरोनं पॅकर्स बोलावले होते. त्यांची लगबग दिसत होती.

हे काय झालं? नंदिनीला खूपच वाईट वाटलं. स्वत:च्या नकळत की किती गुंतली होती त्यांच्यात? त्यांना तर कल्पनाही नव्हती की त्यांच्यामुळेच एका कुटुंबात किती आनंद निर्माण झाला होता. त्या कुटुंबातली गृहिणी किती बदलली होती…आता पुन्हा तेच उदासपण…बोअर रूटीन…दिवसभर नंदिनी अस्वस्थ होती. बाल्कनीतून घरात फेऱ्या मारत होती.

सायंकाळ होता होता ट्रक भरून निघून गेला. हिरोहिरोइन त्यांच्या कारमधून निघून गेली. मांडीवर दुर्बिण ठेवून नंदिनीनं भिंतीला डोकं टेकवलं. कितीतरी वेळ ती तशीच बसून होती.

संध्याकाळी तिचा उतरलेला, मलूल चेहरा सगळ्यांच्याच काळजीचा विषय झाला.

पण, ‘‘जरा बरं वाटत नाहीए,’’ म्हणून तिनं पटकन् खोली गाठली अन् ती अंथरूणावर पडली. त्यानंतरचे चार पाच दिवस खूपच उदास वाटत होतं. नाही म्हणायला त्या आठवड्यात मायलेकींनी दोन दिवस रजा घेतली असावी. त्यांच्या घरात थोडा उत्साह होता. पण नंदिनीची कळी फारशी खुलली नाही.

मात्र एक दिवस स्टुलावर बसून नंदिनी दुर्बिणीतून उगीचच इकडे तिकडे बघत असताना अचानक त्या हिरोवाल्या घरात गडबड जाणवली. तीन चार तरूण मुलांनी तो फ्लॅट बहुधा भाड्यानं घेतला होता.

ती तरूण देखणी मुलं घर लावण्यात मग्न होती. एक जण पडदे लावत होता. दुसरा बहुधा डस्टिंग करत होता, पांढरा टी शर्ट आणि काळी शॉर्ट घातलेला एक जण बाल्कनीत कपडे वाळायला घालत होता. त्याच्या शेजारच्या बाल्कनीत एक तरूण मुलगी कुंड्यांना पाणी घालत होती. पाणी घालताना तिचं लक्ष पुन्हा:पुन्हा बाल्कनीतल्या त्या तरूणाकडे जात होतं.

नंदिनीला हसू फुटलं. ती लक्षपूर्वक पाहत होती. तो मुलगाही त्या मुलीकडे बघून हसला अन् ती मुलगी लाजली. अरेच्चा! इथं तर लव्हस्टोरी सुरू झालीय की! दोघं एकमेकांकडे बघून हसताहेत…मजा येईल आता. शिफ्टिंग झाल्या झाल्याच रोमांसही सुरू झाला.

तेवढ्यात एक वयस्कर स्त्री बाल्कनीत येऊन त्या मुलीला काही म्हणाली. ती बहुधा त्या तरूणीची आजी असावी. मुलीनं लगेच मुलाकडे पाठ केली. मुलगाही लगेच बाल्कनीतून घरात गेला. आजीनं कुंड्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं. मग तीही आत गेली. किती तरी दिवसांनी गाणं गुणगुणत नंदिनी बाल्कनीतून उठली अन् तिनं दुर्बिण कपाटात लपवून ठेवली. आज तिला पुन्हा उत्साही वाटत

उष्ट अन्न

– करूणा साठे

मेरठला पोहोचल्यावर राकेशचं घर शोधायला सीमाला फारसा त्रास झाला नाही. कारमधून उतरून ती बंगल्याच्या गेटपाशी आली. वरकरणी ती अगदी शांत अन् संयमित वाटत असली तरी मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती.

बेल वाजल्यावर ज्या स्त्रीनं दार उघडलं, तिलाच सीमानं विचारलं, ‘‘राकेश घरी आहेत का?’’

त्या स्त्रीच्या डोळ्यात एकदम ओळखीचे भाव उमटले. ‘‘तुम्ही सीमा…सीमाचना?’’
तिनं हसून म्हटलं, ‘‘हो, पण तुम्ही कसं ओळखलंत?’’

‘‘एकदा यांनी ऑफिसमधल्या कुठल्या तरी समारंभाचे फोटो दाखवले होते, त्यात तुम्हाला बघितलं होतं, तेच लक्षात राहिलं, या ना, आत या,’’ तिनं प्रेमानं सीमाचा हात धरून तिला घरात घेतलं.

‘‘मी कोण ते तुम्ही ओळखलंच असेल? माझं नाव…’’

‘‘वंदना!’’ सीमानं तिचं वाक्य पूर्ण केलं.

‘‘मी ओळखते तुम्हाला. राकेशच्या फ्लॅटमध्ये तुमचा फॅमिली फोटो आहे, त्यात बघितलंय मी तुम्हाला.’’

चेहऱ्यावर फारशी प्रतिक्रिया न दाखवता वंदनाने सहजच विचारलं, ‘‘यांच्या आजारपणाचं कसं कळलं?’’

‘‘राकेश माझे सीनिअर आहेत,  त्यांच्याशी मला फोनवर रोजच बोलावं लागतं. ऑफिसचे अपडेट्स द्यावे लागतात.’’

सीमाच्या बोलण्यात संकोच किंवा भीतीचा लवलेशही नव्हता. ‘‘आता कशी आहे तब्येत?’’ तिनं विचारलं.

‘‘ते स्वत:च सांगतील तुम्हाला. मी पाठवते त्यांना. मला फक्त एवढंच सांगा की तुम्हाला चहा, कॉफी किंवा सरबत यापैकी काय आवडेल?’’

‘‘गरम कॉफी मिळाली तर मजा येईल.’’

‘‘तुम्ही आमच्या खास पाहुण्या आहात सीमा. आजतागायत यांच्या ऑफिसमधल्या कुठल्याच सहाकाऱ्याला मी भेटले नाहीए. तुम्हीच पहिल्या.’’ अगदी जवळच्या मैत्रीणीशी बोलावं इतक्या आपलेपणानं वंदना बोलत होती.

मग सीमा वंदनाच्या व्यक्तीमत्त्वाचा विचार करू लागली. रंगानं गोरीपान नसली तरी नाकीडोळी आकर्षक होती. चेहऱ्यावर हसरा भाव अन् मार्दव होतं. दोन मुलांची आई होती पण हालचालीत चपळपणा होता. किंचित गोलाई असलेल्या बांध्याला निरोगीपणाचा तजेला होता.

ती फक्त दहावीपर्यंत शिकली आहे हे सीमाला ठाऊक होतं, पण तिच्या वागण्याबोलण्यात सुसंस्कृतपणा अन् आत्मविश्वास होता हे सीमाला मान्य करावंच लागेल.

थोड्या वेळानं राकेशनं ड्रॉइंगरुममध्ये प्रवेश केला. सीमाच्या अगदी जवळ येत त्यानं हसून म्हटलं, ‘‘तुला इथं बघून मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. काल फोनवर तू इथं येण्याबद्दल काही बोलली नव्हतीस?’’

‘‘मी सांगितलं असतं तर तू मला इथं येऊ दिलं असतंस?’’ त्याच्या हातावर हात ठेवत सीमानं विचारलं.

‘‘नाही…बहुधा नाहीच.’’

‘‘म्हणूनच मी सांगितलं नाही अन् सरळ येऊन थडकले. आज तब्येत कशी आहे?’’

‘‘गेले दोन दिवस ताप नाहीए, पण फार थकवा वाटतोय.’’

‘‘एकूणच सर्वांगावर अशक्तपणा जाणवतोय…अजून काही दिवस विश्रांती घे,’’ सीमानं म्हटलं.

‘‘नाही, परवा, सोमवारी मी जॉईन होतो. खरंतर तुझ्यापासून फार काळ दूर राहवत नाहीए.’’

‘‘जरा हळू बोल. तुझी बायको ऐकेल,’’ सीमानं त्याला दटावलं. मग म्हणाली, ‘‘एक विचारू?’’

‘‘विचार.’’

‘‘वंदनाला आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल माहीत आहे का?’’

‘‘असेल, पण कधीच काही म्हटलं नाहीए,’’ राकेशनं खांदे उडवून खूपच बेपर्वाइनं म्हटलं.

‘‘माझ्याशी ती इतकी छान वागली की माझ्याविषयी तिच्या मनात राग किंवा तक्रार असेल असं मला वाटत नाही.’’

‘‘तू माझी परिचित अन् सहकारी आहेस, त्यामुळेच ती तुझ्याशी वाईट वागण्याचं धाडस करणार नाही. तू माझ्या घरात अगदी बिनधास्तपणे वावर. हास, बोल…वंदनाचं टेन्शन घ्यायची गरज नाहीए,’’ प्रेमानं सीमाच्या गालावर थोपटून राकेश समोरच्या सोफ्यावर बसला.

‘‘राकेशच्या आजारपणामुळे सीमाची व त्याची भेट होत नव्हती, त्यामुळे आज त्याच्यासमोर बसून त्याच्याशी गप्पा मारताना सीमाला वंदनाची आठवणही आली नाही. वदंना रिकामा कप, प्लेटस् उचलून घेऊन गेली तरीही ती दोघं बोलतच होती.’’

सीमा राकेशच्या प्रेमात पडली त्याला एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला होता. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा राकेश तिला पहिल्या भेटीतच इतका आवडला की तिच्या नकळत ती त्याच्यावर प्रेम करू लागली. लोक काय म्हणतील याचा विचारही न करता काही महिन्यातच तनमनानं ती त्याला समर्पित झाली.

त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी खूप आकांडतांडव केलं.

‘‘हे बघा, मी आता तीस वर्षांची होतेय. मला लहानशी मुलगी समजून दिवसरात्र मला समजावण्याचा खटाटोप आता सोडा. दोघांनाही सांगतेय, समजलं का?’’ एकदा सीमानं चढ्या आवाजातच त्यांना ऐकवलं. ‘‘माझ्या लग्नाची काळजी करू नका. कारण योग्य वयात तुम्ही माझ्यासाठी चांगला मुलगा बघू शकला नाहीत. माझ्या भविष्याची काळजी, माझ्या सुखदु:खाची चिंता माझी मलाच करू द्या. राकेशशी माझे असलेले संबंध तुम्हाला पसंत नाहीत तर मी वेगळी राहते.’’

सीमाच्या या धमकीमुळे आईबाबा गप्प बसले. त्यांचा राग ते अबोल्यातून व्यक्त करायचे. कमावत्या आणि हट्टी पोरीला बळजबरीनं काही करायला लावणं त्यांना आधीही जमलं नव्हतं, आताही जमणार नव्हतं.

वय वाढत गेलं अन् मनाजोगता जोडीदार भेटला नाही, तेव्हा सीमानं मनातल्या मनातच अविवाहित राहण्याचा निश्चय केला होता. पण एकट्यानं आयुष्य काढणंही सोपं नसतंच. त्याचवेळी फॅमिली मेरठला ठेवून तिच्या गावी नोकरीसाठी आलेल्या एकट्या, देखण्या राकेशनं तिचं मन जिंकून घेतलं. राजीखुशीनं ती त्याला समर्पित झाली.

‘‘मी तुझ्याबरोबर तुझी प्रेयसी, मैत्रीण बनून जन्मभर राहायला तयार आहे. तरीही लग्न करून एकत्र राहण्याची मजाच काही वेगळी असते. तुला काय वाटतं राकेश?’’ सुमारे एक महिन्यापूर्वी सीमानं राकेशच्या फ्लॅटमध्ये सकाळी त्याला बेड टी देता देता विचारलं होतं.

‘‘तू तयार असशील तर आजच मी तुझ्याशी दुसरं लग्न करायला तयार आहे,’’ राकेशनं तिच्या प्रश्नाला फारसं गंभीरपणे न घेता म्हटलं.

सीमा मात्र गंभीर होती. ‘‘असं करणं म्हणजेच स्वत:लाच फसवणं आहे.’’

‘‘तुला जर असं वाटतंय तर मग लग्नाचा विषय कशाला काढतेस?’’

‘‘माझ्या मनातलं तुला नाही तर कुणाला सांगणार मी?’’

‘‘ते बरोबर आहे,’’ राकेश म्हणाला, ‘‘पण आपलं लग्न होऊ शकत नाही…तसा काही पर्यायच नाहीए.’’

‘‘तू माझ्यावर खरं खरं, मनापासून प्रेम करतोस ना?’’

‘‘हा काय प्रश्न आहे?’’ तिच्या ओठांचं चुंबन घेत तो म्हणाला.

‘‘तू नेहमीच मला सांगतोस की तुझी पत्नी वंदना नाही तर मीच तुझी हृदयस्वामिनी आहे, हे खरंय ना?’’

‘‘होय, वंदना माझ्या दोन मुलांची आई आहे. ती सरळसाधी स्त्री आहे. जे आकर्षक व्यक्तिमत्त्व मला आवडतं तशी ती नाही. खरं तर आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी मी लग्नच करायला नको होतं. पण तरीही लग्न करावं लागलं. आता केवळ कर्तव्य म्हणून मी तिच्याशी बांधलेला आहे,’’ राकेश गंभीरपणे म्हणाला.

सीमाही एव्हाना थोडी घायकुलीला आली होती. ‘‘आपल्या प्रेमासाठी, माझ्या आनंदासाठी तू वंदनाला घटस्फोट देऊ शकतोस ना?’’ तिनं आपल्या मनातली इच्छा बोलूनच दाखवली.

‘‘नाही, कधीच नाही. याबाबतीत या विषयावर तू मला कधीच प्रेशराइज करू नकोस. वंदनानं मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी. कारण ती पूर्णपणे मला, माझ्या मुलांना, माझ्या संसाराला समर्पित आहे. तिचा काहीही दोष नसताना मी तिला घटस्फोट देणं म्हणजे तिच्यावर अन्याय करणं आहे,’’ राकेश इतक्या कठोरपणे बोलला की त्यानंतर सीमानं हा विषय पुन्हा काढला नाही.

त्याच दिवशी सीमानं वंदनाला भेटण्याचा निश्चय केला. त्यामागे काय हेतू आहे हे ही तिला कळलं नाही. तरीही तिला वंदनाला भेटायचं होतं, समजून घ्यायचं होतं. कदाचित मनात सुप्त इच्छा होती की वंदनाला तिचं अन् राकेशचं प्रेमप्रकरण कळलं की ती आपण होऊनच त्याच्यापासून दूर होईल.

वंदना अत्यंत सालस अन् साधी होती. तिनं ज्या आपलेपणानं सीमाचं स्वागत केलं, त्यामुळे तर सीमाला तिच्याविषयी कौतुकच दाटून आलं. चीड, संताप, हेवा असं काहीच वाटलं नाही.

उलट राकेश वंदनाशी जसं वागत होता, ते तिला खूपच विचित्र आणि असंस्कृतपणाचं वाटत होतं. फक्त ती राकेशवर प्रेम करत होती म्हणूनच ते तिनं सहन केलं होतं.

स्वत:च्या घरातही राकेश तिच्याशी इतका मोकळेपणानं वागत होता की तिलाच संकोच वाटत होता. सीमाचा हात हातात घेणं, सूचक बोलणं, तिच्या गालाला हात लावणं वगैरे बिनधास्त चालू होतं.

वंदनानं हे पाहिलं तर याचा धाक फक्त सीमाला होता. एकदा तर त्यानं सीमाला मिठीत घेऊन तिचं चक्क चुंबन घेतलं…सीमा खूप घाबरली.

‘‘हे काय करतोय राकेश? अरे, वंदनानं बघितलं तर? मलाच खूप लाजल्यासारखं होईल.’’ सीमा खरोखर रागावली होती. धास्तावली तर होतीच.

‘‘रिलॅक्स सीमा,’’ अत्यंत बेपर्वाइनं राकेशनं म्हटलं. तो हसून म्हणाला, ‘‘माझ्या हृदयात तुझ्याविषयी खरं प्रेम आहे. तू माझ्यासाठी वासनापूर्तीचं साधन नाहीस खरं सांगतो. जो आनंद वंदनाच्या संगतीत कधी मिळाला नाही तो तुझ्या संगतीत मिळतो.’’

‘‘पण इथं…घरात वंदना असताना… तिच्या घरात तू माझ्यावर प्रेम करतोस हे मलाच विचित्र वाटतंय…सहन होत नाहीए…’’

‘‘बरं बाई, आता काही गडबड करत नाही. शांत राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव.’’

‘‘काय?’’

‘‘वंदनाला घाबरू नकोस. जर तिनं कधी मला संधी दिली तर मी तुझ्याचकडे येईन. तिला सोडून देईन…’’ राकेश खूपच भावनाविवश झाला होता. त्याचं ते भावनाविवश होणं तिला सुखावून गेलं तरीही मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी बोच वाटतच होती.

एकाएकी सीमाला वाटलं, याक्षणी वंदनाशी बोलायला हवं. तिचं एकूण व्यक्तिमत्त्व, तिचे प्लस अन् मायनस पॉईंट जाणून घ्यायला हवेत. तिच्यात कुठं, कसली उणीव आहे अन् कुठं तिचे गुण सीमापेक्षा जास्त ठरतात ते कळायलाच हवं. त्याशिवाय तिला राकेशपासून दूर करता येणार नाही, तोपर्यंत सीमाचं राकेशशी लग्न होणार नाही.

‘‘मला जेवायला घालूनच वंदना स्वत: जेवायला बसते. तू सुरूवात कर, ती नंतर जेवून घेईल,’’ राकेश अलिप्तपणे बोलला. त्याच्या शब्दातून पत्नीविषयीची बेपर्वाई स्पष्ट जाणवत होती. राकेशनं स्वत: खूप उत्साहानं सीमाचं ताट वाढलं.

सीमाला जाणवलं जेवण खरोखर चविष्ट आहे अन् सगळेच पदार्थ राकेशच्या आवडीचे आहेत.

वंदना समोर असतानाच राकेशनं सीमाला विचारलं, ‘‘स्वयंपाक कसा झालाय?’’

‘‘स्वयंपाक अतिशय सुरेख झालाय. प्रत्येक पदार्थ इतका चविष्ट आहे की कौतुक करायला शब्द अपुरे पडतील,’’ सीमानं मनापासून कौतुक केलं.

‘‘वंदना उत्तम स्वयंपाक करते, त्यामुळेच माझं वजन कमी होत नाही.’’

राकेशच्या तोंडून स्वत:चं कौतुक ऐकून वंदनाचा चेहरा आनंदानं डवरून आला हे सीमाच्या लक्षात आलं. राकेश तिच्याकडे बघतही नव्हता, ती मात्र प्रेमळ नजरेने त्याच्याकडेच बघत होती.

वंदनाचं राकेशवर प्रेम आहे. ती कधीच त्याला घटस्फोट देऊन त्याच्यापासून वेगळी होणार नाही. हा विचार मनात येताच सीमा एकदम बैचेन झली.

जेवण झाल्यावर राकेश ड्रॉइंगरूममधल्या दिवाणावर आडवा झाला. थोडा वेळ सीमाशी गप्पा मारल्या अन् त्याला झोप लागली. सीमा तिथून उठून स्वयंपाक घरात आली.

वंदना जेवणाची दोन ताटं वाढत होती, ‘‘तुम्ही अन् आणखी कोणी अजून जेवायचं राहिलंय का?’’ सीमाने विचारलं.

‘‘हे दुसरं ताट त्या पाठीमागच्या घरात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीसाठी आहे,’’ घराकडे बोट दाखवत वंदनानं म्हटलं.

‘‘तुमची मैत्रीण इथं येईल जेवायला?’’

‘‘नाही. निशाकडे ताट पोहोचवायचं काम माझा मोठा मुलगा सोनू करेल.’’

‘‘तुमच्या दोन्ही मुलांना तर मी भेटलेच नाहीए, आहेत कुठं दोघं?’’ सीमानं विचारलं.

‘‘छोट्या भानूला थोडा ताप आलाय. तो बेडरूममध्ये झोपून आहे. सोनूला बोलावते मी. सकाळपासून तो निशाकडेच आहे.’’ वंदनानं मागचं दार उघडून सोनूला हाक मारली. काही वेळातच तो धावत आला. वंदनानं त्याची सीमाआण्टीशी ओळख करून दिली. त्यानं दोन्ही हात जोडून नमस्कार केला. मग आईनं सांगितल्याप्रमाणे झाकलेलं ताट घेऊन तो हळूहळू निशाच्या घरी गेला.

‘‘गोड आहे मुलगा,’’ निशानं म्हटलं.

‘‘निशाही त्याच्यावर खूप प्रेम करते. अगदी आपल्या मुलाप्रमाणे. सोनूला दोन दोन आयांचं प्रेम मिळतंय,’’ सीमाच्या डोळ्यात बघत वंदनानं म्हटलं.

किचनला लागून असलेल्या व्हरांड्यात एक छोटसं गोल टेबल होतं. भोवती चार खुर्च्या होत्या. त्या दोघी तिथंच बसल्या. वंदनानं जेवायला सुरूवात केली.

‘‘निशाला स्वत:चं मूल नाहीए का?’’ सीमानं विचारलं.

‘‘तिनं लग्नच केलेलं नाही. तुझ्यासारखीच अविवाहित आहे ती,’’ वंदना आता एकेरीवर आली. ‘‘प्रत्येक स्त्रीच्या हृदयात आईचं प्रेम असतं. तिच्या हृदयातलं प्रेम निशा माझ्या सोनूवर उधळतेय,’’ वंदना हसत म्हणाली.

काही वेळ कुणीच बोललं नाही. मग सीमा म्हणाली, ‘‘मी लग्न करणार नाही असं ठरवलं होतं, पण आता मी कुणाबरोबर तरी लग्न करून वैवाहिक आयुष्य जगायचं ठरवलं आहे.’’ याच संदर्भात बोलायला इथं आले आहे.

 

‘‘मी निशालाही नेहमी म्हणते की लग्न कर, पण ती ऐकत नाही. म्हणते, लग्नाशिवाय मला सोनूसारखा छान मुलगा मिळाला आहे तर विनाकारण कुणा अनोळखी माणसाशी लग्न करून मी आपलं स्वातंत्र्य का घालवून बसू? तिला अगदी खात्री आहे की माझा सोनू तिची म्हातारपणची काठी ठरेल,’’ सीमाच्या बोलण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करत वंदना बोलत राहिली.

‘‘मी आणि राकेश, एकमेकांना ओळखतो, त्याला वर्षापेक्षा अधिक काळ उलटला आहे. ते भेटल्यामुळेच माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला. त्या आधीचं आयुष्य अगदीच नीरस, उदासवाणं, एकाकी होतं,’’ वंदनाचं बोलणं मनावर न घेता सीमानं आपल्या विषय पुढे दामटला.

‘‘आता या निशाच्या आयुष्यातही सगळा आनंद माझ्या सोनूमुळेच आहे. दर दिवशी ती सोनूला काही ना काही गिफ्ट देतच असते.’’

 

‘‘राकेशचे अन् माझे संबंध केवळ सहकारी किंवा मित्रत्त्वाचे नाहीत. आम्ही त्या पलीकडे पोहोचलो आहोत. त्यांचं माझ्यावर अन् माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे,’’ सीमानं आपल्या मनातलं बोलून दाखवलं.

वंदना उदास हसली, ‘‘माझ्या सोनूला स्वत:च्या कह्यात करण्यासाठी निशाने त्याला सतत महागड्या हॉटेलात जेवायला नेऊन त्याची सवय बिघडवली आहे. आता त्याला घरचा, माझ्या हातचा स्वयंपाक आवडत नाही. सतत बाहेरचं चमचमीत खायला हवं असतं त्याला.’’

‘‘तू पुन्हा पुन्हा सोनूबद्दल बोलते आहेस. तू माझ्याशी राकेशबद्दल का बोलत नाहीस?’’ सीमानं आता चिडूनच विचारलं.

खूपच आपलेपणानं, डाव्या हातानं सीमाच्या खांद्यावर थोपटत वंदनानं त्याच लयीत बोलणं सुरू ठेवलं, ‘‘निशाला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. सोनू जर तिचा स्वत:चा मुलगा असता तर तिला असं स्वयंपाक न करता जगता आलं असतं? मुलाची किंवा पाल्याची संपूर्ण जबाबदारी घेणं सोपं नसतं. आपल्या पोटच्या मुलाला स्वत: कष्ट घेऊन, स्वत:च्या हातानं करून घालण्यात कसला आलाय त्रास? ते काही ओझं वाटावं असं काम आहे का?’’

‘‘छे छे, आईला आपल्या मुलासाठी काही करणं म्हणजे ओझं वाटत नाही,’’ सीमानं म्हटलं.

‘‘ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासाठी, त्याच्या आनंदासाठी काहीही करायला त्रास वाटत नाही, ओझं वाटत नाही. ही निशा तर सोनूला कायदेशीरपणे दत्तक घेण्यासाठी माझ्यावर सतत दबाव आणते आहे.’’

‘‘या बाबतीत तुझं स्वतचं काय मत आहे, वंदना.’’

वंदना तशीच उदास हसली, ‘‘खऱ्या अर्थानं प्रसववेदना सोसल्याशिवाय कुणी स्त्री आई झाली आहे का? आई होऊ शकते का? घर संसाराचा रामरगाडा ओढायला लागणारी उर्जा, शक्ती फक्त आईकडे असते. मुलाला वळण लावणं, गरजेला धाक दाखवणं, एरवी आधार देणं, मदत करणं, निरपेक्ष प्रेम करणं हे आईशिवाय कुणीच करू शकत नाही. मावशी, काकी, मामी, आत्या किंवा मोलानं ठेवलेली बाई आईची जागा घेऊच शकत नाही.’’

‘‘बरोबर बोलते आहेत तू. मीही आता आपला संसार मांडायचा…’’

वंदनानं तिला हातानं गप्प राहण्याची खूण केली. ‘‘निशानं सोनूवर कितीही प्रेम केलं तरी शेवटी तो माझाच मुलगा असेल. समाजात लोक त्याला माझा मुलगा म्हणूनच ओळखतात. निशानं दिलेल्या महागड्या भेटवल्तू, त्याच्यासाठी करत असलेला भरमसाट खर्च, सोनू सध्या तिच्याकडे घालवत असलेला वेळ हे सगळं मान्य केलं तरी तो माझा मुलगा आहे. हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही…तुला एक विचारू का?’’

‘‘विचार…’’ सीमा एकदम गंभीर झाली. त्यासाठीच तो विषय तिनं लावून धरला आहे.

‘‘माझ्या काळजाचा तुकडा आहे माझा सोनू…समजा अगदी नाइलाजानं, काळजावर दगड ठेवून मी निशाला माझा मुलगा दत्तक दिलाही, तरी ती त्याची आई होऊ शकेल का? सोनूला जन्माला घातल्याचा जो आनंद मी उपभोगला, तो तिला मिळेल का? त्याच्याबरोबर घालवलेल्या गेल्या आठ वर्षांतले अनेक सुखदु:खाचे प्रसंग जे मी जगले, ते तिला जगता येतील का? त्याच्या ज्या काही खस्ता मी खाल्ल्या त्या तिला खाव्या लागल्याच नाहीत…हे सगळे अनुभव ती कुठून मिळवणार? अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला रडवून, दु:खी करून ती हसू शकेल का? आनंदात राहू शकेल?’’ वंदनाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

वंदनानं तिच्या हातावर हात ठेवला. तिचा कंठ दाटून आला होता, ‘‘सीमा, तुला धाकटी बहीण मानून माझ्या मनातल्या काही गोष्टी मी तुझ्याशी बोलणार आहे. माझ्या आयुष्यात माझा संसार, माझा नवरा अन् माझी मुलं यांच्या खेरीज दुसरं काहीही नाही. माझं सगळं जीवन या तिन्हीभोवती विणलेलं आहे. राकेशना सोडण्याची कल्पनाही मला असह्य होते.’’

‘‘राकेश तुझ्यावर प्रेम करतात ही गोष्ट माझ्यासाठी फार दु:खद आहे. त्यांचे सगळे दोष पोटात घालून मी त्यांच्यासाठी सतत खपत असते. आनंदानं त्यांची सेवा करते. त्यांचं त्यांच्या दोन्ही मुलांवर जिवापाड प्रेम आहे. मुलांमुळे का होईना ते या घराशी, पर्यायाने माझ्याशीही कायम बांधील राहतील. एरवी त्यांचं प्रेम माझ्यापेक्षा तुझ्यावर अधिक आहे ही भावना मला असुरक्षितपणाची जाणीव करून देते, पण ते आमची बांधीलकी तोडणार नाहीत या भावनेनं खूपच सुरक्षित वाटतं.’’

वंदनाच्या चेहऱ्यावर तेच खिन्न हास्य होतं,  ‘‘माझ्या हृदयात डोकावण्याची क्षमता तुझ्यात असेल तर तुला माझ्याविषयी सहानुभूतीच वाटेल, कारण प्रेमाच्या मोबदल्यात प्रेम न मिळण्याची खंत मला नेहमीच वाटत राहिलीय, ती वेदना फक्त ज्याला प्रेम करूनही प्रेम मिळालं नाही तीच व्यक्ती समजू शकते.’’

राकेश अन् सोनू दोघांच्या वयात खूप अंतर आहे पण तरीही, त्यांच्यात एक साम्य आहे. माझा नवरा तुझ्याशी अन् सोनू निशाशी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी संबंध ठेवून आहेत. त्या संबंधासाठी घर सोडण्याचं धारिष्ट्य दोघांमध्येही नाही. आईसारख्या खस्ता निशा मावशी काढू शकत नाही हे या वयातही सोनूला कळतं अन् बायको इतकं झिजणं तुला जमणार नाही हे राकेश जाणून आहेत.

सोनू अन् राकेशच्या आनंदासाठी मी त्यांचे निशाशी अन् तुझ्याशी असलेले संबंध कुठल्याही तक्रारीविना स्वीकारले आहेत.

पण माझे त्यांच्याशी असलेले संबंध फक्त माझ्या मृत्यूनंतरच संपतील. मी तर ते दोघं जसे आहेत तसेच त्यांना स्वीकारलंय, कोणतीही तक्रार न करता, मी त्यांच्यासोबत आनंदानं राहतेय, पण मला एक कळलेलं नाहीए की निशा काय किंवा तू काय, तुम्हाला यांच्याशी भावनिक बांधिलकी बाळगायची गरजच का आहे? तिला मुलगा हवाय किंवा तुला नवरा, आयुष्याचा जोडीदार हवाय तर तुम्ही दोघी अगदी नवी सुरूवात का करत नाही? कितीही चविष्ट अन्न असलं, तरी दुसऱ्याचं उष्ट खायची तुम्हाला काय गरज आहे? उष्ट अन्न…मी काय म्हणतेय कळतंय का? ’’

बोलता बोलता वंदनाला अश्रू अनावर झाले. काही क्षण सीमा तशीच उभी होती. मग झटकन पुढे होऊन तिनं वंदनाचे अश्रू पुसले. तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिनं मनापासून म्हटलं, ‘‘थँक यू.’’

पुढे एक अक्षरही न बोलता ती झटकन ड्रॉइंगरूममध्ये निघून आली.

अजूनही राकेश तिथं दिवाणावर झोपला होता. सीमानं टेबलवरची आपली पर्स उचलली अन् राकेशकडे वळूनही न बघता त्याच्या घराबाहेर पडली.

राकेशशी असलेले आपले अनैतिक प्रेमसंबंध कायमचे संपवायचे हाच एक विचार तिच्या मनात प्रबळ.

वेलीच सुचलेलं शहाणपण

– सुधा गुप्ते

बरेच दिवसात निमाशी माझ्या फोनवर संभाषण झालं नव्हतं. अनेकदा फोन करायचं ठरवलं अन् दुसऱ्याच कुठल्यातरी कामात गुंतल्यानं फोन करणं राहून गेलं. निमा माझी लाडकी धाकटी बहीण आहे.

‘‘मावशीची काळजी करू नकोस, अगं ती चांगलीच असेल ना? म्हणून तर तिचं रडगाणं गाणारा फोन आला नाहीए…काही प्रॉब्लेम असता तर तिचा नक्कीच फोन आला असता. रडत भेकत तिनं तुला आपली अडचण सांगितलीच असती.’’ मानवनं माझ्या मुलानं हसत हसत मला टोमणा दिला. धाकट्या मानसीनं हसून त्याला अनुमोदन दिलं. तिनं त्याला हसत हसत दोन्ही हातांचे अंगठे उंचावून ‘बकअप’ केल्याचं मी बघितलं.

हल्लीची मुलं खरोखरंच हुषार अन् जागरूक आहेत. त्यांच्या वयात आम्हाला एवढी समजूत नव्हती हे मान्य करावंच लागेल. नातलगांविषयी एवढं ज्ञान आम्हाला नव्हतं. त्यांनी काहीही म्हटलं तरी आम्हाला ते खरं वाटायचं, पटायचं. शिवाय एकत्र कुटुंबात मुलांचा संबंध फक्त मुलांशीच यायचा. घरातल्या मोठ्या माणसांचे आपापसातले हेवेदावे, रागलोभ किंवा प्रेम, आदर, त्याग वगैरे आमच्यापर्यंत पोहोचत नसे. आता चार माणसांच्या कुटुंबात कुणी कपाळावर किती आठ्या घातल्या, कुणी कुणावर डोळे वटारले हे सगळ्यांच्या लक्षात येतंच.

‘‘अगं आई, काल मी मावशीला मॉलमध्ये बघितलं. कदाचित बँकेतून लवकर बाहेर पडली असेल. केवढी ढीगभर खरेदी केलेली होती? दोन्ही हातात पिशव्या मावत नव्हत्या. तिच्या दोन कलिग्जपण होत्या सोबत.’’

‘‘तुझ्याशी बोलली का?’’

‘‘नाही गं! मी थर्डफ्लोअरला होतो अन् मावशी सेकंड फ्लोअरला होती.’’

‘‘पण ती मावशीच होती कशावरून? दुसरी कुणी असू शकते. तू वरून खाली कसं बघितलंस?’’

‘‘म्हणजे काय? मी काय आंधळा आहे का? अन् वरून खालचं व्यवस्थित दिसतं. चांगली हसत खिदळत होती. तुला फोन करते तेव्हा मात्र सतत रडत असते. मला असं होतंय, माझे पैसे संपले. मला पैशांची अडचण आहे. आनंदाचे क्षण शेयर करताना तिला तुझी आठवण येत नाही अन् थोडाही प्रॉब्लेम आला की रडत तुझ्याकडे येते. अशा माणसांची काळजी कशाला करायची, सोड तिची काळजी करणं. तिचा फोन नाही आला याचाच अर्थ सगळं काही ठीकठाक चाललंय…’’

मुलाचं सडेतोड पण, खरं बोलणं मला आवडलं नाही. मी त्याला रागावून पिटाळून लावलं. विषय तिथंच संपला. पण त्यानं त्याच्या मावशीचं किती सूक्ष्म निरीक्षण केलंय याचं मला कौतुकही वाटलं. तो बोलला ते खरंच होतं. अगदी फुसक्या गोष्टींसाठी रडून भेकून गहजब करणं अन् समोरच्याला पेचात आणणं तिला छान जमतं. पण मोठ्यातला मोठा आनंद ती कधीही बोलून दाखवत नाही. म्हणते, आनंद कधी दाखवू नये. दृष्ट लागते. कुणाची दृष्ट लागते, आमची? माझी? मी तिची मोठी बहीण, आईसारखी तिची काळजी घेते. सतत तिच्या अडचणी सोडवते. आमची कशी दृष्ट लागेल? काहीतरी अंधश्रद्धा. असा कसा स्वभाव हिचा?

आता मागच्या आठवड्यातच तर सांगत होती, पैशांची फारच अडचण आहे. मार्च एंडिंग म्हटलं की पैशांची ओढाताण असतेच. थोडे पैसे देशील का? मी काटकसरीनं राहून काही पैसा शिल्लक ठेवत असते. त्यामुळे मला अशी अडचण कधी जाणवत नाही. हे पैसे मी कुणाच्याही नकळत साठवत असते. ऐनवेळी काही अडचण आलीच तर कामी यावेत हाच माझा उद्देश्य असतो. त्यातून काही पैसे तिला द्यावेत असं मी मनोमन ठरवलंही होतं. तिला दिलेले पैसे परत कधीच मिळत नाहीत हे मलाही ठाऊक आहे. चुकून माकून आलेच तर थोडे थोडे करत अन् तिच्या सोयीनं येतील. आईबाबांनी मरताना मला सांगितलं होतं की धाकट्या बहिणीला आईच्या मायेनं सांभाळ. तिला कधी अंतर देऊ नकोस. निमा माझ्याहून दहा वर्षांनी धाकटी आहे. मी तिची मोठी बहिण आहे, तरीही तिच्या अनंत चुका, मी आईच्या मायेनं पोटात घालते. तिचे अपराध माझ्या नवऱ्यापासून, मुलांपासून, जगापासून लपवून ठेवते. अनेकदा माझा नवरा मला समजावतो, ‘‘शुभा, तू फार भाबडी आहेस. बहिणीवर प्रेम कर. पण तिला स्वार्थी होऊ देऊ नकोस. ती फार आत्मकेंद्रिय आहे. तुझा विचार ती करत नाही. आईवडिलांनीच मुलांना शिकवायला हवं. चुका केल्या तर त्या दाखवून द्यायला हव्यात. गरज पडली तर कान उपटायला हवेत. तू तिला प्रत्येक वेळी पाठीशी का घालतेस? तिला समजव…रागव…’’

‘‘मी काय रागावणार? ती स्वत: शिकलेली आहे, नोकरी करतेय. लहान मुलगी थोडीच आहे ती रागवायला? प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो…’’

‘‘प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो तर तिला राहू दे आपल्या स्वभावासोबत. चूक झाली तर जबाबदारीही घेऊ दे स्वत:वर. तू तिला प्रोत्साहन देतेस, जबाबदारी घेऊ देत नाहीस हे मला खटकतं.’’

उमेश म्हणाले ते अगदी बरोबरच होतं. पण काय करू? मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याकरता वेगळाच जिव्हाळा आहे. मी म्हणते ती लहान नाहीए, पण मी तिला लहान समजून तिच्या चुकांवर पांघरूण घालत असते. मी खरं तर तिला १०-२० हजार रुपये द्यायचे असं ठरवलं होतं. ती म्हणाली होती की या महिन्याचा सगळा पगार इन्कम टॅक्स भरण्यात संपला म्हणून. आता घरखर्च कसा चालणार? पण खरं तर मार्च महिन्यात इन्कम टॅक्स भरायचा असतो हे का तिला माहीत नाही. लोक आधीपासून त्यासाठी तयारी करतात. अरे, पावसाळ्याची बेगमी तर पशूपक्षीही करूनच ठेवतात ना? पावसाळ्यासाठी आपली छत्री आपणच घ्यावी लागते. लोक थोडीच तुमच्यासाठी छत्री घेऊन ठेवतील? आपलं डोकं, आपलं शरीर जर ओलं होऊ द्यायचं नाही तर आपणच प्रयत्न केला पाहिजे. उपाय शोधला पाहिजे. मला नवल वाटलं. निमाकडे पैसे नसताना तिनं मॉलमधून पिशव्या भरभरून खरेदी कशी काय केली? शॉपिंगसाठी पैसे कुठून आले?

उमेशचं म्हणणं योग्यच आहे. मीच तिला बिघडवते आहे. खरं तर मी तिचे कान उपटून तिला योग्य मार्गावर आणायला हवं. काही नाती अशी असतात की ती तोडता येत नाहीत. पण त्यांचा उपद्रव मात्र फारच होतो. आपण नातं निभवायला बघतो, पण त्याचं रूप अक्राळ विक्राळ होतं, आपल्यालाच गिळू बघतं. आता चाळीशीला आलीय निमा. कधी तिच्या सवयी बदलणार? कदाचित कधीच ती तिच्या या चुकीच्या सवयी बदलणार नाही. तिच्यामुळे अनेकदा माझ्या संसारात कुरबुरी होतात, माझी घडी विस्कटते. कुणा दुसऱ्याच्या पाय पसरण्यामुळे माझी चादर, माझं अंथरूण मला पुरत नसेल तर त्यात माझाच दोष आहे. आपल्या अंथरूणात किंवा पांघरूणात मी कुणाला कशाला शिरू द्यावं? आईवडिलांना मुलांचा कान धरून समजावण्याचा, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा अधिकार असतोच. अर्थात् एका ठराविक वयानंतर मुलं आईबाबांना जुमानत नाहीत अन् आईवडीलही त्यांना काही सांगू धजत नाहीत हा भाग वेगळा. तरीही चूक होत असेल तर सावध करण्याचा हक्क आईबापाला असतोच.

दुपार माझा विचार करण्यात गेली अन् सायंकाळी मी सरळ निमाच्या घराच्या दिशेनं चालू लागले. मानव कोचिंगक्लासला निघाला होता. त्याला त्याच वाटेनं जायचं होतं. मी त्याला वाटेत मला निमाकडे सोडायला सांगितलं. मुद्दामच मी तिला आधी फोन केला नाही. मला दारात बघून निमा एकदम स्तब्ध झाली.

‘‘ताई…तू?’’

निमानं आश्चर्यानं विचारलं.

‘‘ताई, अगं फोन न करता कशी आलीस?’’

‘‘म्हटलं तुला आश्चर्याचा धक्का द्यावा. आत तरी येऊ देशील की नाही? दार अडवूनच उभी आहेस?’’

तिला हातानं बाजूला सारत मी आत शिरलेच. समोर कुणीतरी पुरूष बसलेला होता. बहुधा तिच्या ऑफिसमधला सहकारी असावा. टेबलावर खाण्यापिण्याच्या वस्तूंची रेलचेल दिसत होती. हॉटेलातून मागवलेलं असावं. ज्या डब्यांमधून आलेलं होतं, त्यातूनच खाणंही सुरू असावं. ही निमाची फार जुनी अन् घाणेरडी सवय आहे. अन्न व्यवस्थित भांड्यांमधून काढून ठेवत नाही. सामोसे, वडे, भजी वगैरे तर सरळ बांधून आणलेल्या कागदी पाकिटातूनच खायला लागते. आम्हालाही तसंच देते. वर म्हणते, ‘‘शेवटी जाणार तर पोटातच ना? मग उगीच भांड्याचा पसारा कशाला? धुवायचं काम वाढतं.’’

मला बघून तो पुरूषही दचकला. भांबावला. त्याला नक्कीच वाटलं असेल की निमाची बहीण अगदीच गावंढळ आहे. बेधडक घरात शिरलीय.

मी ही पक्केपणानं म्हटलं, ‘‘अगं, हे हक्काचं घर आहे माझं. फोन करून येण्याची फॉर्मेलिटी कशाला हवी होती? एकदम मनात आलं, तुला भेटावं म्हणून, तर आले झालं…का गं, तुला कुठं बाहेर वगैरे जायचं नव्हतं ना?’’

मी मानभावीपणे म्हटलं, ‘‘मध्यंतरी तू म्हणाली होतीस, तुला बरं नाहीए…म्हणून तुझ्या तब्येतीची काळजी वाटून मी आले.’’

‘‘हो…हो ना, हे माझे सहकारी विजय हेदेखील माझ्या तब्येतीची चौकशी करायला आले आहेत.’’

माझ्या प्रश्नानं तिलाही दिलासा दिला. मी तब्येतीचा विषय काढताच तिला विजयच्या तिथं उपस्थित असण्याचं कारण सांगता आलं. एरवी ती दोघंही गोंधळली होती.

माझी बहीण आहे निमा. तिचे सगळे रंगढंग, तिच्या सवयी, तिचे रागलोभ मी चांगले ओळखते. लहानपणापासूनच तिचा चेहरा बघून ती काय करणार आहे, तिच्या मनात काय आहे, तिनं काय केलंय, हे सगळं मी ओळखतेय. माझ्याहून ती दहा वर्षांनी लहान आहे अन् माझी फार फार लाडकी आहे. माझ्या वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत मी घरातली एकुलती एक लेक होते. आईवडिल एका मुलीवरच संतुष्ट होते. पण मला मात्र एकटेपणा सहन होत नव्हता. नातलगांना, अवतीभोवती सर्वांना दोन दोन मुलं होती. प्रत्येकाला एक भावंड होतं. मीच एकटी होते. मोठ्यांमध्ये जाऊन बसलं की ते हाकलायचे, ‘‘जा आत. इथं कशाला बसतेस? आत खेळत बैस.’’ आता एकटी मी काय खेळू? कुणाशी खेळू? निर्जीव खेळणी अन् निर्जीव पुस्तक…मला कुणी तरी सजीव खेळणं हवं होतं. शेवटी मला भावंड आणायचा निर्णय आईबाबांना घ्यावा लागला.

भावंड येणार म्हटल्यावर आईबाबांनी मला समजवायला सुरूवात केली की येणाऱ्या बाळाची सर्व जबाबदारी माझ्यावर असणार आहे. मी स्वत:ला विसरून निमाचं सगळं बघायला लागले. तिच्यापुढे मला आपली सुखदु:ख, आपल्या इच्छा, अपेक्षा कशाचीही तमा वाटत नव्हती. दहाव्या वर्षीच मी एकदम जबाबदार, गंभीर अन् मोठी मुलगी झाले.

निमा केवळ माझ्यासाठी या जगात आली आहे किंबहुना माझ्यासाठीच तिला आणण्यात आलंय ही गोष्ट माझ्या मनावर इतकी खोल कोरली गेली होती की मी तिची आई होऊनच तिला सांभाळू लागले. आम्ही जेवत असताना तिनं कपडे ओले केले तर मी जेवण सोडून आधी तिचे कपडे बदलत असे. त्यावेळी आई उठत नसे. आता वाटतं, आईनं तरी माझ्यावर इतकी जबाबदारी का टाकली? तिचंही ते कर्तव्यच होतं ना की त्यांनी एक बहीण मला देऊन माझ्यावर उपकार केले होते? इतकं मोठं कर्ज माझ्यावर झालं की चाळीस वर्षं मी फेडतेय, फेडता, फेडता मी दमलेय तरी ते कर्ज फिटत नाहीए.

‘‘ताई ये, बैस ना,’’ अगदी अनिच्छेनंच निमा म्हणाली.

माझं लक्ष सोफ्यावर विखुरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यांकडे गेलं. त्यावर त्याच मॉलचं नाव होतं, ज्याचा उल्लेख मानवनं केला होता. काही घालून काढून टाकलेले नवे डेसेसही तिथंच सोफ्यावर होते. बहुतेक त्यांची ट्रायल निमानं घेतली असावी किंवा ते घालून त्या तिच्या सहकाऱ्याला दाखवले असावेत.

माझ्या मेंदूनं दखल घेतली…हा माणूस कोण आहे? त्याचे अन् निमाचे संबंध कसे, कुठल्या प्रकारचे आहेत? त्यालाच हे कपडे घालून ती दाखवत होती का?

‘‘तुला ताप आला होता का? सध्या वायरलचीच साथ आहे. हवा बदलाचा परिणाम होतोच,’’ मी सगळे कपडे अन् पिशव्या बाजूला ढकलून स्वत:ला बसण्यापुरती जागा करून घेत विचारलं.

तेवढ्यात तो पुरुष उठला, ‘‘बराय, मी निघतो,’’ त्यानं म्हटलं.

‘‘अहो बसा ना, निदान तुमचं खाणं तरी पूर्ण करा. निमा तूही बैस ना,’’ मी म्हटलं. तसं दचकून दोघांनी माझ्याकडे बघितलं.

‘‘तब्येतीची काळजी घ्या. येतो मी,’’ म्हणत तो निघून गेला. निमाही अस्वस्थपणे बसली होती.

‘‘अगं, आजारी होतीस तर हे असलं हॉटेलचं खाणं, त्यातूनही नूडल्स अन् मंचूरियन कशाला खातेस?’’ मी टेबलवरच्या डब्यांकडे बघत म्हटलं. डब्यात एकच चमचा होता म्हणजे दोघं एकाच चमच्यानं खात होती का?

‘‘हे बघ निमा, थोडं काम होतं तुझ्याकडे. म्हणून मी आलेय. फोनवर बोलणं मला प्रशस्त वाटेना. मला पैसे हवेत. मानसीच्या कोचिंगक्लाससाठी. तुझ्याकडून माझे एकूण चाळीस हजार रुपये येणं आहे. तू निदान पंधरा वीस हजार दिलेस तर माझी सध्याची गरज भागेल…’’

निमानं माझ्याकडे विचित्र नजरेनं बघितलं. जणू ती प्रथमच मला बघत होती…इतके दिवस मी पैसे कधीच परत मागितले नव्हते, त्यामुळेच ते परत करणं तिलाही गरजेचं वाटलं नव्हतं. मी तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होते. एक तर तिची छानशी संध्याकाळ बिघडवून टाकली होती अन् शिवाय ती विवाहबाह्य संबंधात अडकल्याचंही माझ्या लक्षात आलं होतं.

फार फार वाईट वाटतंय मला. आम्ही दोघी एकाच आईबापाच्या पोरी जन्माला येऊनही आम्हा दोघींमध्ये इतका फरक असावा? एकाच घरात वाढलो, एकच अन्न आम्ही खाल्लं, तरीही आमच्या अंगात वाहणाऱ्या रक्तानं असे वेगवेगळे परिणाम दाखवावेत?

‘‘अगं पण ताई, माझ्याकडे पैसे कुठाय?’’ निमा चाचरत म्हणाली.

‘‘का गं? इथं एकटीच राहतेस, घरभाडं बँक भरतेय. नवरा अन् मुलगा तुझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहतात. त्यांचा काडीचा खर्च नाही तुझ्यावर, तर मग सगळा पैसा जातो कुठे?’’

निमा अवाक् होती, सतत तिची बाजू घेणारी, तिला सतत चुचकारून घेणारी तिची ताई आज अशी कशी वागतेय? इतकं कसं बोलतेय? खरं तर निमाच्या वागणुकीमुळे तिचं कुटुंब अन् माझंही कुटुंब नाराजच असायचं. मीच तिच्यासाठी बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी होते, कारण मनातून मला उगीचच आशा होती की अजूनही वेळ गेली नाहीए, निमा सावरेल, स्वत:ला बदलेल.

‘‘निमा, मला तुझ्यासारखी नोकरी नाही. नवरा देतो त्या पैशातून घर चालवून मी पैसे शिल्लक टाकते म्हणून पैसा जमतो. अक्षरश: एक एक रूपया करत पैसे जमवले आहेत मी. दोन्ही मुलांचे कोचिंग क्लास गरजेचे आहेत. तिथं भरपूर पैसे भरावे लागतात. तुझे पैसे नको देऊस, फक्त माझे पैसे परत केलेस तरी माझी गरज भागेल,’’ एवढं बोलून मी उठून उभी राहिले.

निमा पुतळ्यासारखी बसून होती. मी कधी अशी वागेन असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या आजच्या रंगीत सोनेरी संध्याकाळचा शेवट असा होईल अशी तर तिला कल्पनाही नसेल.

काय बोलणार होती ती? तिच्यासाठी मी भक्कम आधार होते. माझ्या आडोशाला येऊन ती अजयलाही गप्प बसवायची.

बिचारा अजय खरं तर पत्नीपीडित नवऱ्यांच्या संघटनेचा अध्यक्ष शोभला असता. मला ते कळत होतं, पण बहिणीवरचं प्रेम मला ते वळू देत नव्हतं. मीच कमी पडले. निमाला आधीच ऐकवलं असतं तर बरं झालं असतं. ती चुकतेय हे मी का सांगू शकले नाही? मला वाईट वाटतंय, स्वत:चाच राग येतोय.

मला त्या घरात बसवेना. जीव गुदमरत होता. नकारात्मक लहरी सतत अंगावर आदळताहेत असं वाटत होतं. आज प्रथमच मला तिच्यापासून लांब लांब जावं असं वाटू लागलं. तिच्यात एरवी मला आईबाबाच दिसायचे…पण आज नाही दिसले.

‘‘निमा, येते मी…एवढंच काम होतं.’’

मी ताडकन् बोलून चालू लागले. रिक्षावाला समोरच भेटला. त्याला घराचा पत्ता सांगितला. गळा दाटून आला होता. डोकं गरगरत होतं. डोळेही भरून आले होते. डोळे पुसून मी मागे वळून बघितलं…निमा बाहेर आली नव्हती. मला बरंच वाटलं. आता ती पैसे परत करेल न करेल, पुन्हा मागणार नाही. माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. मी दोन तीनदा दीर्घ श्वास घेतला. हलकं वाटलं. मनातून एक सकारात्मक विचार उमटला…आता नक्कीच निमा बदलेल. ती माझ्यासारखी होण्याचा प्रयत्न करेल.

सत्य समजल्यावर

कथा • शालिनी गुप्ते

देह मनाची सारी मरगळ दूर करणाऱ्या पहिल्या पावसासारखंच पहिलं प्रेमही असतं. त्या सरीत भिजणाऱ्यालाच त्याचं सुख कळतं.

रवीवर मी प्रेम केलं ते मनापासून, ते माझं पहिलं प्रेम होतं. त्यामुळेच माझ्या प्रेमावरचा विश्वास अधिक दृढ होता. मी घरी सांगून टाकलं, ‘‘लग्न करेन तर फक्त रवीशी. नाहीतर लग्नच करणार नाही.’’

‘‘त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही. पण त्यानं एकदा घरी येऊन सर्वांना भेटायला तर हवं ना? त्यालासुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे हे त्याच्या तोंडून कळायला हवं,’’ दादा म्हणाला. त्याच्या बोलण्यातला खोचकपणा अन् रवीविषयीची नाराजी मला खटकली.

‘‘हो, हो. मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते. त्याला हीरो व्हायचंय. तेवढ्यासाठीच तो दिवसरात्र स्टुडियोच्या चक्करा मारतोय. बस्स, एक ब्रेक मिळू देत, त्याचं इतकं नाव होईल की लोक डोळे विस्फारून बघत राहतील. तेवढयासाठीच तो मुंबईला गेलाय.’’

‘‘त्याला ब्रेक मिळणार कधी अन् तो हीरो होणार कधी?’’ दादानं हसत हसत टोमणा दिला अन् तो बाहेर निघून गेला.

‘‘आई, बघ ना, दादा रवीबद्दल कसं बोलतोय ते? पण बघाल तुम्ही एक दिवस तो खूप मोठा कलाकार म्हणून नाव काढेल,’’ बोलता बोलता मला रडू फुटलं.

‘‘रडू नकोस बाळा. तो हिरो बनेलही पण आत्ता या क्षणी तो काय करतोय?’’ बाबांनी चहा घेताना विचारलं.

या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. कारण तो मुंबईत नक्की कुठं आहे अन् काय करतोय हे मला तरी कुठं त्यानं सांगितलं होतं?

‘‘तुझ्या हिरोबद्दल तुलाच ठाऊक नाही अन् तू त्याच्याशी लग्न करायला निघाली आहेस? अगं, आम्ही जो मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे तो एकदा बघ. रूप, गुण, संस्कार, स्वत:चा व्यापार, उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी सगळंच तुला अन् आम्हाला साजेसं आहे.’’

आईबाबांनी परोपरीनं समजावलं अन् मी समीरशी लग्न करून संसाराला लागले. त्या आधी मी एकदा मुंबईला जाऊन रवीचा शोध घेण्याचाही विचार केला होता. पण मुंबईत मी त्याला कुठं अन् कशी शोधणार होते? फार असह्य वाटलं मला. मनात रवी होता. शरीर फक्त समीरच्या मालकीचं होतं.

समीरशी लग्न झालं. त्यांच्या घरात, कुटुंबात अन् समीरच्या आयुष्यात मला मानाचं स्थान होतं. घराची स्वामिनी म्हणून पत्नी म्हणून जे जे माझ्या हक्काचं होतं, ते सगळं सगळं मला समीरनं दिलं. पती म्हणून तो कुठं कमी पडला नाही. पण मी मात्र मनात रवी असल्यानं समीरला न्याय देऊ शकले नाही.

हनीमूनसाठी आम्ही मसूरीला गेलो होतो. मालरोडवर भटकत असताना अवचित पाऊस पडायला लागला. समीरला पावसात भिजायला फार आवडतं हे मला तेव्हा कळलं. तो पावसात भिजत होता. मी मात्र आडोसा बघून स्वत:ला पावसापासून वाचवत होते.

‘‘नेहा, येना, बघ पावसात भिजायला किती मजा येतेय…’’ समीर म्हणाला.

‘‘नको गं बाई, उगीच गारवा बाधायचा. तूच ये इथं.’’ मी म्हणाले.

‘‘डार्लिंग, गारठ्याचं काय घेऊन बसलीस? अगं तुला मिठीत घेऊन इतकी ऊब देईन की तू अक्षरश: वितळशील…ये…ये…पटकन्,’’ समीरनं मला ओढून पावसात उभं केलं. त्याचं बोलणं ऐकून जवळपास उभी असलेली टूरिस्ट मंडळी हसायला लागली. मी लाजून चूर झाले.

आम्ही पावसात मनसोक्त भिजलो. मला तर थंडी बाधली नाही पण समीरला मात्र त्रास झाला. तो गोळ्या घेऊन, स्वेटर घालून पांघरूणात गुडूप झोपला. मी मात्र रवीच्या आठवणीनं तळमळत होते. सतत मनात येत होतं, जर आज समीरच्या जागी नवरा म्हणून रवी असता तर या हनीमूनची मजाच वेगळी असती.

मला एक जुना प्रसंग आठवला. मी व रवी मोटरसायकलनं येत होतो. एकाएकी जोरात पाऊस पडायला लागला. रवीनं गाडी बाजूला उभी केली अन् मला ओढत तो मोकळ्या मैदानात घेऊन गेला. दोन्ही हात पसरून तो पावसाचा आनंद उपभोगत होता. मलाही त्यानं तसंच करायला लावलं. प्रथम मी संकोचन मग मुक्त मनानं हात पसरून पावसाचं स्वागत करत मनसोक्त भिजले. पाऊस कमी झाला तेव्हा प्रथम आम्ही जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊन गरमागरम चहा घेतला. कपडे पिळून वाळवले अन् मग घरी गेलो. पावसात भिजण्याचा आनंद त्यानंतर मी रवीसोबत खूपदा घेतला. चिंब ओल्या देहावर त्याच्या हाताचा स्पर्श मला किती रोमांचित करायचा…

रवीची आठवण सतत मनात असल्यामुळे मी समीरशी कधी मोकळेपणानं वागू शकले नाही.

आमच्या दोघांमध्ये सतत रवी आहे असं मला वाटायचं. तो त्याचा हक्क मागतोय असा मला भास व्हायचा. शरीर समीरचं झालं होतं, मन मात्र रवीजवळच होतं.

सासरच्या घरी पैसा, सत्ता, सन्मान अन् स्वातंत्र्य असूनही मी अजून अस्वस्थ होते. बेचैन होते. काही तरी खटकतंय हे समीरच्या लक्षात आलं. तो म्हणाला, ‘‘तू अशी उदास का असतेस? माझ्या व्यवसायामुळे मी तुला खूप वेळ देऊ शकत नाही, पण तू एकटी का राहतेस? घराबाहेर पड, मित्र मैत्रिणी मिळव. ग्रुप तयार कर. तुलाच उत्साह वाटेल. नवं काही बघायला, शिकायला मिळेल.’’

ती कल्पना मला आवडली. मी आमच्या सोसायटीच्या भिशी ग्रुपची मेंबर झाले. एक दोन अजून ग्रूप जॉइन केले.

नव्या वातावरणात, नव्या ओळखीमुळे मी खरंच बदलले. मनातली निराशा कमी होऊ लागली. हा बदल मला मानवला. एव्हाना आमच्या लग्नाला सहा वर्षं झाली होती. माझा मुलगा बंटी चार वर्षांचा होता. आयुष्य एखाद्या शांत नदीप्रमाणे वाहत होतं.

पण ही शांतता फार काळ टिकली नाही. रवी पुन्हा माझ्या आयुष्यात आला.

समीर अन् मी सिनेमाला जाणार होतो. पण अचानक समीरला काही काम आलं अन् मी एकटीच सिनेमाला गेले.

तिकिटं काढलेली होती. मी गाडीतून टॉकीजपाशी उतरले अन् समोरच रवी दिसला.

दोघंही स्तब्ध होऊन एकमेकांकडे किती तरी वेळ बघत होतो.

‘‘मी स्वप्न बघतेय का?’’ मी मलाच चिमटा घेत प्रश्न केला.

‘‘स्वप्नंच असावं,’’ रवीचा कंठ दाटून आल्यासारखं वाटलं मला.

आम्ही दोघं गर्दीपासून जरा लांब जाऊन उभे राहिलो. ‘‘होतास कुठं? फोन नाही, पत्र नाही. मी वेड्यासारखी वाट बघत होते,’’ मला रडूच यायला लागलं.

रवीही दाटल्या कंठानं म्हणाला, ‘‘नेहा, एक क्षण तुझ्या आठवणींवाचून गेला नाही. माझं शरीर फक्त माझ्याजवळ होतं. मन तर तुझ्याचपाशी होतं.’’

काही क्षणांतच आम्ही स्वत:ला सावरलं. रवी म्हणाला, ‘‘चल आत जाऊयात, आजच्या सिनेमात माझा व्हिलनचा रोल आहे. पण खूप जबरदस्त रोल आहे.’’

आम्ही आत जाऊन बसलो. रवीचा रोल खूपच छान होता. त्याची मेहनत त्याच्या कामात दिसत होती. मला सिनेमा आवडला. सिनेमा संपला अन् लोकांनी रवीला ओळखलं. गराडा घातला. अभिनंदनाचा त्याच्यावर वर्षाव होत होता. मी सरळ घरी निघून आले.

आता मला फक्त रवी अन् रवीच हवा होता. त्याच्या एक दोन पिक्चरची शूटिंग सुरू होती. मी तिथंही त्याच्याबरोबर जाऊन आले. त्याचा रिकामा वेळ माझ्याबरोबरच तो घालवत होता.

माझी इच्छा होती त्यानं एकदा तरी समीरला भेटावं. पण त्याची अजिबात इच्छा नव्हती, ‘‘माझ्या शत्रूचं नाव माझ्यासमोर काढू नकोस. माझी जखम पुन्हा भळभळा वाहू लागते. तुझ्याशी लग्न नाही करू शकलो हा माझा पराजय वाटतो मला. पण एक दिवस मी या पराभवाला माझ्या विजयात बदलेन…’’

त्याच्या या शब्दांनी मला खूप बरं वाटायचं. रवीला मिठी मारावी असं वाटायचं. पण मनांवर ताबा ठेवून वागत होते.

अनेकदा मनात यायचं त्याला विचारावं की मधल्या काळात होतास कुठे? माझं लग्न झालं त्या आधी भेटला का नाहीस? पण मी नाही विचारलं. त्याला दु:खी करावं असं मला वाटत नव्हतं.

एका सायंकाळी पाच वाजता मला रवीचा फोन आला.

‘‘काय करते आहेस?’’

‘‘विशेष काहीच नाही.’’

‘‘ताबडतोब ये. अमुक अमुक हॉटेलात मी वाट बघतोय,’’ त्यानं एका पंचतारांकित हॉटेलचं नाव घेतलं.

‘‘का? अचानक काय झालंय?’’

‘‘प्रश्न विचारू नकोस. एक सरप्राइज आहे,’’ रवीच्या मी इतकी आहारी गेले होते की क्षणाचाही विचार न करता मी जायचं ठरवलं. समीर तेव्हा बिझनेस टूरवर होता. मी बंटीची तयारी करून त्याला मैत्रीणीकडे सोडला. बऱ्याचदा तो तिच्याकडे रहायचा, कारण मैत्रिणीचा मुलगा त्याच्याच शाळेत होता. स्वत:चं आवरून मी त्या हॉटेलात पोहोचले.

रवी माझी वाटत बघत होता. ‘‘आजच मला एक फार चांगला रोल मिळाला आहे. हा सिनेमा चांगला चालला तर मी रातोरात स्टार बनेन बघ,’’ त्यानं मला जवळ ओढून घेत म्हटलं.

‘‘नको रवी, हे बरोबर नाही,’’ मी स्वत:ला त्याच्यापासून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला.

‘‘प्रेमात सगळं बरोबर असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेमात समर्पण गरजेचं असतं. तुझं माझं प्रेम तर किती जुनं आहे. खरं प्रेम आहे आपलं. कधीपासून आपण एकमेकांसाठी तळमळतो आहोत.’’

त्यानं मला एक सुंदर कागदी पिशवी दिली. मी ती उघडून बघितली. आत एक सुंदर गुलाबी रंगाची नाइटी होती.

खोलीतल्या बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत त्यानं मला कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये पाठवलं.

नाइटीला येणारा गुलाबाच्या अत्तराचा सुगंध, अंथरूणावरच्या गुलाबपाकळ्यांचा गंध, खोलीतला स्वर्गीय निळसर प्रकाश अन् मंद धुंदावणारं संगीत…मी जणू स्वत:चं भान विसरले.

अन् मग तेच घडलं…जे फार पूर्वी घडलं असतं.

शरीर तृप्त होतं. मन तृप्त होतं. प्रथमच मी इतकं सुख, अशी तृप्ती अनुभवत होते. समीरबरोबर मी अशी खुललेच नव्हते.

‘‘रवी, खरंच मी खूप तृप्त आहे.’’ मी त्याला बिलगत म्हणाले.

‘‘अजून काय झालंय? तुला मी इतकं सुख देणार आहे जे आजपर्यंत कुणा स्त्रीला मिळालं नसेल,’’ माझं चुंबन घेत रवी म्हणाला, ‘‘मला समीरचा हेवा वाटतो. माझी दौलत त्याच्या वाटयाला आली.’’

‘‘आत्ता त्याचं नाव नको ना घेऊस…’’ मला त्या क्षणी फक्त रवी हवा होता.

सगळी रात्र मी रवीबरोबरच होते. सकाळी लवकर उठले. पटकन् आवरून रवीला बाय करून हॉटलातून निघाले. येताना बंटीला बरोबर घेतलं. तो शाळेसाठी तयारच होता. त्याला अन् मैत्रिणीच्या मुलाला शाळेत सोडून मी माझ्या घरी पोहोचले.

रवीबरोबर त्या रात्री शरीरसुखाचा अनुभव घेतल्यापासून माझ्या चित्तवृत्ती उल्हसित असायच्या एकूणच मी खूप आनंदात होते.

एकदा मी कुठलं तरी गाणं गुणगुणत होते. समीर म्हणाला, ‘‘इतकं आनंदात तुला कधीच बघितलं नव्हतं.’’

मी मनोमन दचकले. सावरून घेत हसत म्हटलं, ‘‘हल्ली चांगला ग्रुप मिळाला आहे. छान काम करतोय आम्ही…त्यामुळेच…’’

‘‘तू अशी आनंदात असलीस ना की मला ही खूप छान वाटतं,’’ समीर अगदी मनापासून म्हणाला अन् त्यानं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं.

त्याक्षणी मला रवीचीच आठवण झाली. केवळ रवीमुळे माझ्या जीवनात आनंद निर्माण झाला होता. आज दुसऱ्यांदा रवीनं मला त्याच हॉटेलात बोलावलं होतं. त्याच्या प्रेमाच्या ओढीनं मी ही जायला तयार होते.

प्रश्न बंटीचा होता. तो शाळेतून अजून आला नव्हता. मला काळजीत बघून त्याच दिवशी माझ्याकडे रहायला आलेल्या सासूबाईंनी म्हटलं, ‘‘अगं, मी आहे ना इथं. मी सांभाळीन त्याला. तू तुझा कार्यक्रम रहित करू नकोस.’’

त्यांचे मनापासून आभार मानत मी पटकन् आवरून बाहेर पडले. रिक्षा करून सरळ हॉटेलला पोहोचले. भराभर चालत, लॉबी ओलांडून रवीच्या खोलीशी आले.

खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. दार ढकलून आत जाणार तेवढ्यात रवीच्या तोंडून माझं नाव ऐकलं. आत अजून कुणीतरी होतं. रवी अन् त्याचं बोलणं चालू होतं. मी पटकन् दाराआड झाले. हळूच बघितलं. रवी कुणासोबत बसून दारू पित होता. खोलीत सिगारेटचा धूर कोंदला होता.

‘‘तुझी ती कबुतरी येणार तरी केव्हा रे? मला तर फारच तहान लागलीय तिची,’’ दारू ढोसत तो माणूस म्हणाला. त्यानं रिकामा केलेला ग्लास पुन्हा दारूनं भरत अत्यंत नम्रपणे रवी म्हणाला, ‘‘सर, अगदी कुठल्याही क्षणी येईल ती.’’

‘‘अरे, पण ती तुझी गर्लफ्रेंड आहे. माझ्याबरोबर ती…’’

‘‘सर, त्याची काळजी करू नका. ती माझ्या प्रेमात इतकी खुळावली आहे की माझ्या म्हणण्यासाठी काय वाट्टेल ते करेल,’’ रवी हसत हसत म्हणाला.

‘‘सर, आज तुम्ही माझा अभिनय बघाल. आज तिला मी अशी खुलवीन की माझ्याबरोबर तुम्हालाही ती पूर्ण सुख देईल. भयंकर हॉट आहे साली,’’ सिगरेट ओढत रवी बोलला.

‘‘बरं तर मी निघतो. तू मला फोन कर. मी माझ्या खोलीत वाट बघतो.’’ तो माणूस बोलला.

‘‘सर, माझा हिरोचा रोल तर पक्का आहे ना?’’ दीनपणे रवीनं विचारलं.

‘‘पक्का म्हणजे पूर्णपणे पक्का…ती पोरगी गेली की तुझं कॉन्ट्रॅक्ट साइन करायचं.’’

हे सगळं ऐकलं अन् पृथ्वी आपल्या भोवती फिरतेय असं वाटलं मला. संताप असा आला होता की आत जाऊन दोघांची थोबाडं फोडावीत. पण ते बरोबर नव्हतं. मी उलट्या पावली माघारी वळले. घाईघाईनं बाहेर पडून रिक्षा केली.

मनात संताप मावत नव्हता. रवीचं ते किळसवाणं रूप बघून माझ्या अंगावर शहारे आले. रिक्षात असताना रवीचा फोन पुन्हा येत होता. मी फोन बंद करून टाकला. घरी कधी पोहोचते असं झालं होतं.

घरी पोहोचले तर समीर अन् बंटी बागेत फुटबॉल खेळत होते.

‘‘तू कधी आलास?’’ मी समीरला विचारलं.

‘‘मुद्दाम घरी लवकर आलो. बंटीशी खेळायचं होतं अन् आजची संध्याकाळ खास तुझ्यासाठी. सिनेमा बघायचाय अन् जेवण बाहेरच करू.’’

समीरशी डोळे भिडवून बोलायची मला भीती वाटली. स्वच्छ निर्मळ चरित्र्याचा प्रेमळ नवरा माझा अन् मी अशी…त्याचा विश्वासघात करणारी…

‘‘आज? नको…नको…उद्या सकाळी बंटीची शाळा आहे…’’ मी समीरला टाळायला बघत होते.

सासूबाई पुन्हा मदतीला आल्या, ‘‘बंटीला मी बघेन गं? जा तुम्ही दोघं…’’

माझा बिघडलेला मूड समीरच्या सान्निध्यात पूर्वपदावर आला. सिनेमा बघून जेवण आटोपून आम्ही बाहेर आलो तेवढ्यात पावसाला सुरूवात झाली. गाडीचं दार उघडून आत बसणाऱ्या समीरला मी ओढून बाहेर काढलं.

‘‘चल, पावसात भिजूयात,’’ मी म्हटलं, तेव्हा त्यानं आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं.

आम्ही दोघं मनसोक्त पावसात भिजलो. आता माझं मन आणि माझा देह एकदम स्वच्छ होता. मनातला संताप आता निवळला होता. विषाद दूर झाला होता. आता फक्त प्रेमच प्रेम होतं मनात समीरविषयी.

मी अंतबार्ह्य बदलले होते. जणू पुनर्जन्म झाला होता. समीरनं मला मिठीत घेत माझ्या ओठांचं चुंबन घेतलं अन् मला जाणवलं त्याचाच अधिकार आहे माझ्या मनावरही. आता रवी माझ्या आयुष्यातून हद्दपार झाला होता.

दिल्या घरी तू सुखी रहा

– कथा प्राच भारद्वाज

रचना वरकरणी शांतपणे घरकाम आटोपत असली तरी मनात प्रचंड वादळ घोंघावत होतं. तिला शारीरिकदृष्ट्या काहीच त्रास नव्हता, पण मन मात्र रक्तबबांळ झालं होतं. ओठांवर नेहमीचं स्निग्ध हसू ठेऊनच ती वावरत होती, पण एकुलता एक लाडक्या लेकीच्या, त्यातून अगदी एवढ्यातच लग्न झालेल्या लेकीच्या आयुष्यात आलेल्या या भूकंपानं मनातून तीसुद्धा हादरलीच होती. फक्त नवरा अन् लेक यांना काही कळू नये म्हणून हास्याचा मुखवटा घालून होती.

रचनानं अलीकडेच पेपरला वाचलं होतं, ‘‘हनीमूनहून परतल्याबरोबर नवविवाहित जोडपी सरळ घटस्फोटाचीच मागणी करतात. अशा तऱ्हेच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे.

खरं तर हनीमूनला गेल्यावर जेव्हा दोघंच सतत एकमेकांबरोबर असतात, तेव्हा त्यांना एकमेकांच्या गुणदोषांची जाणीव होते. मुलांमध्ये तशीही सहनशीलता कमी असते. पण समाजानं ते गृहीत धरलंय. समजूतीची, तडजोडीची अपेक्षा अर्थात्च वधूकडून जास्त असते. पण आता बदललेल्या काळात मुलीही तेवढ्याच असहिष्णू अन् तापटपणे वागू लागल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांची बरोबरी करतात, प्रसंगी अधिक चांगला परफॉर्मन्स देतात तर मग त्यांनी तडजोड का म्हणून करायची?

पेपरला असं वाचणं अन् आपल्याच घरात असं काही घडणं यात फार फरक असतो. रचनाला त्यामुळेच धक्का बसला होता.

तिनं अन् सुधीरनं खूप थाटात अन् धूमधडाक्यानं आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न करून दिलं होतं. सगळं अगदी रीतसर, विधीवत केलं होतं. किती पाहुणे, नातलग, इष्टमित्र, परिचित लग्नाला आले होते. व्याहीदेखील तोलामोलाचे होते. लतिका अन् मोहन जवळजवळ एक वर्ष कोर्टशिपमध्ये होते. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली गेली होती. संगीत, मेंहदी, प्रत्येक प्रसंगाला नामवंत बॅण्ड अन् गाणारी मंडळी बोलावलेली. लग्नालाही प्रत्येक क्षेत्रातली बडी बडी मंडळी हजेरी लावून गेली होती. लतिका अन् मोहित खूप आनंदात होते. लेटेस्ट डिझाइनचे पोषाख, दागिने, जेवायला पारंपरिक अन् परदेशी असे मिळून शंभर एक पदार्थ…काही म्हणता काही उणीव नव्हती त्या समारंभात.

हनीमूनचा कार्यक्रमही चांगला वीस दिवसांचा होता. एकविसाव्या दिवशी लेक अन् जावयाला घ्यायला सुधीर अन् रचना भला मोठा फुलांचा गुच्छ घेऊन एयरपोर्टला पोहोचले. विवाहसौख्याच्या तेजानं उजळलेले लेक-जावयाचे चेहरे बघायला ती दोघं आतूर होती. हनीमूनच्या पहिल्या काही दिवसात फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवर त्यांचे दोघांचे प्रेमसागरात डुंबत असणारे सेल्फी अन् फोटो बघून आई बाप सुखावले होते. पण एयरपोर्टवर आईबाबांना मिठी मारून झाल्यावर लतिकानं ड्रायव्हरला सांगितलं की तिची बॅग आईप्पांच्या गाडीत ठेव. मोहित बिचारा सासूसासऱ्यांना न भेटताच दुसऱ्या वाटेनं निघून गेला.

चकित झालेल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून लतिका सरळ कारमध्ये जाऊन बसली. हळूहळू सगळी परिस्थिती रचना अन् सुधीरच्याही ध्यानात आली. रचनानं एकूणच परिस्थितीची सूत्रं आपल्या ताब्यात घेऊन सुधीरला शांत राहण्यास सांगितलं. घरातलं वातावरण आनंदी व प्रसन्न राहील याकडे ती विशेष लक्ष देत होती. पूर्वीच्या काळी एकदा सासरी गेलेली मुलगी प्राण गेला तरी परतून माहेरी येत नसे, पण आजचा काळ तसा नसला तरी लग्नसंबंध म्हणजे धक्का लागताच कोलमडून पडेल असं तकलादू नातं नसतंच. लतिका मोकळेपणानं काहीच सांगत बोलत नव्हती. गप्प गप्प बसून असायची. रचनाला फारच वाईट वाटायचं.

‘‘लतिका, मोहितचा फोन आहे तुझ्यासाठी…तो विचारतोय तुझा मोबाइल बंद आहे का?’’ रचनानं सांगितलल्यावरही लतिका हप्पच होती. फोनपाशी गेली काही तरी बोलली, फोन जागेवर ठेवला अन् पुन्हा येऊन आपलं पुस्तक घेऊन बसली. रचनानं ठरवलं आज लेकीशी मोकळेपणाने बोलायचं. सगळं नाही तरी थोडं बहुत तरी कळायलाच हवं काय बिनसलंय दोघांमध्ये. असेल काहीतरी फुसकंच कारण ज्याचा तिच्या हट्टी, लाडोबा लेकीने उगीचच ‘इश्यू’ केलाय.

‘‘काय झालंय लतिका? तू का नाराज आहेस मोहितवर? अगं आता नवा संसार सुरू करायचाय तुम्हाला अन् हनीमून संपताच तुम्ही दोघं वेगवेगळी झालात?’’

‘‘ममा, खरं सांगते, अगं मी अन् मोहित ना अजिबातच कंपॅटिबल नाही आहोत. त्याला माझ्या भावनांची किंमतच नाही. मी तरी त्याची बेपर्वाई का सहन करू? अगं बारीकसारीक विनोदही त्याला कळत नाहीत. एकदम चिडतो. मी माझ्या मित्रांबद्दल बोललेलं त्याला आवडत नाही. लग्नापूर्वी मला वाटायचं तो माझ्या बाबतीत फार पद्ब्रोसिव्ह आहे म्हणून तो असं वागतो. पण आता लग्न झालंय माझा त्याच्याशी अन् तो आता आला माझ्या आयुष्यात तर मी माझे जुने मित्र त्याच्यासाठी सोडून द्यायचे का? त्याला फक्त त्याच्या कुटुंबाचीच काळजी आहे. हनीमून कसला? त्याच्या कुटुंबात मी सेटल होण्यासाठी कसं वागावं याचं टे्निंगच दिलं त्यानं…आता? फोनवरही म्हणाला, ‘‘मी समजून घ्यायला हवं. थोडी तडजोड करायला हवी.’’

लतिकाच्या बोलण्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्टपणे कळत होती की मोहितला हे लग्न टिकवायचं होतं. त्याला लतिका त्याच्याजवळ हवी होती. खरं तर लतिका अन् तिची आई रचना या दोघी मायलेकीच्या नात्यापेक्षाही मैत्रिणी अधिक होत्या. म्हणूनच तर लतिकानं आपलं मन तिच्यापाशी मोकळं केलं होतं. आता आई म्हणून रचनानं आपली जबाबदारी सिद्ध करायची होती. एकुलत्या एका लाडक्या लेकीला सासरच्या घरी नांदायला पाठवायचं अन् तिचं वैवाहिक आयुष्य सुखी होईल असं काही करायला हवं.

खरं तर वर्षभराच्या कोर्टशिपच्या काळात लतिका अन् मोहित एकमेकांसोबत खूपच खुशीत होते. याचा अर्थ एवढाच की आता जे काही घडतंय ते खूपच तात्पुरत्या वेळेसाठी आहे…कुठलंही नातं स्थिर होण्याआधी अशा उचक्या लागतातच.

नातं नेहमी विश्वासावर टिकून असतं. विश्वासाचं पाणी मिळालं की या उचक्या थांबतातच. अनुभवानं परिपक्व झालेल्या रचनाला एवढं माहिती होतं की नात्यातला दुरावा पटकन् मिटवायला हवा नाहीतर नातं दुभंगतच जातं अन् ते काम दोघांनी मिळून करायचं असतं. तक्रारी किरकोळ आहेत तोवरच हा विषय संपायला हवा.

रचनानं लतिकाला समजावण्याचा प्रयत्न केला, ‘‘हे बघ बाळा, लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नाही. तुझ्या बाहुली घेऊन तू मैत्रीणींकडे गेलीस. तिच्या बाहुल्यासोबत तुझ्या बाहुलीचं लग्नं झालं. खेळ संपला, पार्टी संपली अन् तू तुझ्या बाहुली घेऊन घरी परतलीस असं खऱ्या आयष्यात घडत नाही. एकदा लग्न झालं की मुलीला सासरीच राहावं लागतं. तिथल्या माणसांमध्ये मिळून मिसळून त्यांना आपलंसं करावं लागतं. प्रत्येक विवाहित मुलीला या संक्रमणातून जावंच लागतं.’’

‘‘प्लीज ममा, हे असलं काहीतरी भंकस तुझ्या तोंडी शोभत नाही. तू इतकी जुनाट विचारांची कधीपासून झालीस? मी काही शोभेची बाहुली नाही. जिवंत मुलगी आहे. मला माझ्या भावना आहेत की नाहीत?’’ लतिका काही समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तेव्हा रचनानं ठरवलं आधी मोहितला भेटून त्याच्याशी नीट मोकळेपणानं बोलूयात.

प्रथम दोघांनाही अवघडल्यासारखं झालंच होतं, पण रचनानंच पुढाकार घेत कोंडी फोडली, ‘‘हे बघ मोहित, नात्यानं तरी तू आमचा जावई असलास तरी आमच्या मुलासारखाच आहेस…सध्या तू अन् लतिका दोघंही ताणात आहात…या परिस्थितीतून आपल्याला लवकर बाहेर पडलं पाहिजे. मी अजून फक्त लतिकाचीच बाजू ऐकली आहे, तुझ्या बाजूही मला समजून घ्यायची आहे. तेव्हा तू हातचं काहीही न राखता तुझं मन मोकळं कर. तुझा प्रॉब्लेम कळला तर सोल्युशन शोधणं सोपं होईल.’’

‘‘ममा, तुम्हीच सांगा, ज्या गोष्टी मी पूर्वीच लतिकाला स्पष्टपणे सांगितल्या होत्या, त्याच पुन्हा पुन्हा विचारण्यात काही अर्थ आहे का? लतिकाला ठाऊक आहे आमच्या घरात तुमच्याएवढं पार्टी कल्चर नाहीए. आधीपासून मी तिला याची कल्पना दिली होती. अजून आमच्या घरात जेमतेम आठ दिवस लग्नानंतर राहिली ती तरी तेवढ्या वेळात आपण या पार्टीला जाणार नाही त्या पार्टीलाही जाणार नाही यावरून चिडचिड. आमच्या घरात अजूनही थोडं जुनं वातावरण आहे. घरात आजी आहे. आई, बाबा, दोघं भाऊ, दोघी वहिनी असं एकत्र कुटुंब आहे. हे सगळंही तिला कोर्टशिपच्या काळात ठाऊक होतंच ना? लग्नानंतर काही दिवस तुला आजी अन् आईला सांभाळून घ्यावं लागेल. नंतर तर मी यूएसएसाठी प्रयत्न करतोय, आपण तिकडंच जाऊ बहुधा हेही तिला सांगून झालं होतं. तेव्हा तिनं होकार दिला अन् आता मी माझ्या मर्जीनंच जगणार असा ताठर पवित्रा घेतेय. बरं, घरात असं काय करायचंय सकाळी उठल्यावर मोठ्यांच्या पाया पडायचं, स्वयंपाक काय करायचा याबाबतीत फक्त सल्ला घ्यायचा. बाहेर जायचं झालं तर त्यांना आधी सांगून ठेवायचं. यात जगावेगळं किंवा टॉर्चर होईल असं काय आहे? हे तर अगदी साधे संस्कार आहेत. कुठल्याही मुलीला ते माहीत असावेत किंवा सून म्हणून तिनं ते स्वीकारावेत. माझ्या घरातल्या माझ्या दोघी मोठ्या वहिनीही उच्चशिक्षित अन् समाजात प्रतिष्ठा असलेल्या श्रीमंत कुटुंबातून आलेल्या आहेत. त्याही हे सगळं करतात. मग लतिकाला त्यात काय कमीपणा वाटतो तेच मला कळत नाही.’’

रचना विचारात पडली. मोहितही म्हणतोय, लतिकाही म्हणतेय, आम्ही कंपॅटिबेल नाही म्हणजे नेमकं काय? ‘कंपॅटिबिलिटी’ काय असते? प्रत्येक लग्नात तडजोड करावीच लागते. थोडाफार त्यागही करावाच लागतो. एकाच घरात जन्माला आलेल्या बहीणभावातही मतभेद, विचार भिन्नता असतेच. त्यांच्यात भांडणंही होतात. पण त्या नात्यात घटस्फोट नसतो. पतीपत्नी मात्र फटाकदिशी घटस्फोट घेऊन नातं संपवायला बघतात. मोहितच्या एकूण बोलण्यावरून त्याचं लतिकाविषयीचं प्रेम कळतंय.

‘‘खरं सांगतो ममा, लतिका खूप चांगली मुलगी आहे. माझ्या आईबाबानांही ती खूप आवडते. पण तिचा हट्टीपणा अन् अहंकार फार जास्त आहे. मला मान्य आहे की ती एकुलती एक आहे. फार श्रीमंतीत अन् लाडात वाढलीय. पण लग्नानंतर ती एक जबाबदार पत्नी अन् चांगली सून होईल असं मला वाटलं होतं. तिथंच चूक झाली. मी ही तिला समजून घ्यायला कदाचित कमी पडत असेन, पण आपसात मोकळेपणानं बोलल्याशिवाय सुसंवाद कसा स्थापित होणार?’’ मोहितच्या बोलण्यातला समंजसपणा अन् प्रामाणिकपणा रचनाला खूपच भावला.

रचना घरी पोहोचली, तेव्हा लतिका सोफ्यावर लोळत फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. वेफर्सचं भलंमोठं पाकिट तिनं निम्म्याहून अधिक संपवलेलं होतं. एरवी स्वत:च्या फिगरबद्दल जागरूक असणारी लतिका टेन्शन आलं की बकाबका खात सुटते. तडस लागेपर्यंत खाल्लं की मग ती थोडी रिलॅक्स होते म्हणजे मोहितही टेन्स आहे अन् त्याच्यापासून दूर राहून लतिकाही टेन्स आहेच. दोघांमधल्या अहंकाराच्या भिंतीला भगदाड पाडायची जबाबदारी आई म्हणून रचनानं घेतलीय. प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे असं नसतं तर हरण्यातून धडा घेणं महत्त्वाचं असतं. नातं तुटण्यातून निर्माण झालेला निराशेचा अंधार घर किंवा कुटुंबच नाही तर संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकतो. रचना असं होऊ देणार नाही. तिला तिच्या लेकीचं आयुष्य, प्रेम अन् समंजसपणानं उजळलेलं बघायचं आहे.

‘‘अगं, आम्ही भांडलो अन् मी आईच्याच घरी आलेय…काय? तुला ही बातमी सोनलनं दिली? तिला कुणी सांगितलं? अगं, मी तसा विचार करतेय…मोहितशी लग्न करण्याचा माझा निर्णय मला वाटतं चुकलाच.’’

फोनवर बोलण्यात गर्क असलेल्या लतिकाला आई आल्याचं कळलंच नाही. ती बोलतच होती. रचनाच्या मनात आलं, आपणही मुलीला सासरी पाठवायचं आहे यादृष्टीनं तिला पुरेसे संस्कार दिले नाहीत. कदाचित ती निभवून घेईल असंही आपल्याला वाटलं असावं. लग्नाच्या सुरूवातीला मुली खूपच हळव्या असतात. अगदी नव्या वातावरणात, नवी माणसं, नवे आचार विचार यात रूळायला त्यांना वेळ हवाच असतो. खरं तर मुलीच्या आईनं मुलीला हे सगळं समजावणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच मुलाच्या आईनंही मुलाला समजावून सांगायला हवं की बाबारे, वेगळ्या वातावरणातून आलेली मुलगी हळूहळू घरात रूळेल तोवर तूही तिला सांभाळून घे. प्रत्येक गोष्टीची सक्ती करू नकोस. ती अधिकाधिक कंफर्टेबल कशी राहील ते बघ. अशा प्रयत्नांनीच पतीपत्नीतलं नातं दृढ होतं. त्यांच्यात अधिक सलोखा निर्माण होतो. पतीनं दिलेलं सहकार्य पत्नी कायम लक्षात ठेवते.

‘‘नाही गं, माझी आई खूप समजून घेते मला. मला वाटतं की ती याबाबतीतही माझीच बाजू उचलून धरेल,’’ लतिकानं अगदी आत्मविश्वासानं मैत्रिणीला सांगितलं.

शांतपणे लेकीजवळ सोफ्यावर बसत रचनानं म्हटलं, ‘‘बाळा, तू जो काही निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबाच असेल. इतकी वर्षं प्रत्येक गोष्ट तुझ्या मर्जीनं तुझ्या आवडीनुसार झाली आहे, तशीच पुढेही होईल. तुझं लग्न आम्ही आधुनिक पद्धतीनं केलं तर पुढेही सगळं त्याच इतमामानं करू. तुला मोहितशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतोय ना? तर मग घे घटस्फोट अन् हो मोकळी.’’

रचना मायेनं बोलत होती अन् बारकाईनं लतिकाच्या एकूण प्रतिक्रियेकडेही बघत होती. तिच्या या सडेतोड बोलण्यावर लतिकाची जी प्रतिक्रिया होती ती तिला अपेक्षित अशीच होती.

लतिकाचे डोळे विस्फारले अन् तोंडाचा ‘आ’ वासला. ‘‘अं?’’ तिनं बावचळून विचारलं, ‘‘मोहितला सोडू?’’

‘‘हो गं बाळा, सोड मोहितला. नको असलेल्या नात्याचं ओझं वाहू नये. माझ्या माहितीतला एक मुलगा आहे चांगला फॅशनेबल, श्रीमंत, एकुलता एक, सतत पार्ट्या, पिकनिक म्हणजे तुला हवं तसंच सगळं. खरं तर आम्ही तोच तुझ्यासाठी बघितला होता. पण तू मोहितच्या प्रेमात होतीस म्हणून विषयच काढला नाही,’’ रचना प्रेमळपणे म्हणाली.

रचनाचं बोलणं ऐकून आनंदीत होण्याऐवजी ती दुखावल्यासारखी झाली. चकित नजरेनं आईकडे बघत काही बोलणार त्या आधीच रचनानं पुढला बॉम्बगोळा टाकला. ‘‘म्युच्युअल डायव्होर्समध्ये फार वेळ लागत नाही, लग्न टिकलं त्यापेक्षाही कमी वेळात तुला डायव्होर्स मिळेल. तरी मला कळंत नव्हतं वर्षभर तू कोर्टशिप कशी केलीस मोहितबरोबर…चला तर, तुझा एक महत्त्वाचा निर्णय घेऊन झालाय…मला एका पार्टीला जायचंय…आधीच उशिर झालाय… सी यू लेटर…बाय…’’ रचना पर्स उचलून निघूनही गेली.

आईचं असं निघून जाणं लतिकाला फारच खटकलं. आपल्या लेकीची या क्षणाची मन:स्थिती काय आईला कळत नव्हती? अशावेळी पार्टीला जाणं गरजेचं होतं का? पार्ट्यांना जायला तर लतिकालाही आवडतं. लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी सत्यनारायण होता. लग्नाचे सगळे विधी, रिसेप्शन अन् पूजेत तीन तास बसून नाजुक लतिका अगदी थकून गेली होती. तिचं डोकं सडकून दुखत होतं. घरी प्रसादाला अन् नव्या सुनेला बघायला इतके लोक आले होते.

सासूबाई मात्र शांतपणे खंबीर आवाजात म्हणाल्या, ‘‘आमच्या लतिकाचं डोकं दुखतंय. फार दगदग झालीय गेले दोन दिवस. ती झोपलीय आता. तुम्ही राग मानू नका. समजून घ्या. तीर्थ प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. लग्नाचा व्हिडिओ स्क्रीनवर येतोच आहे. फोटोतलीच सून आता बघा. लतिकाच्यावतीनं मी तुमची क्षमा मागते.’’ लोकांनीही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. प्रसाद व इतर अनेक पदार्थ मनापासून खाऊन लोक घरी गेले. लतिकाची सासू तिच्या खोलीत तिची काळजी घेत बसून होती.

रात्री उशीरा झोपलेली लतिका सकाळी अर्थात्च उशिरा उठली. आई त्यावेळी घरात नव्हती. लतिकानं तिला फोन केला. आईनं फोन उचललाच नाही. नंतर काही वेळानं तिचा मेसेज आला. ‘‘तुझे पपा कामासाठी दुबईला गेलेत म्हणून आज मी माझ्या भावाकडे म्हणजे तुझ्या मामाकडे आलेय. चार दिवस इथंच राहणार आहे.’’ लतिकाला कळेना आईला आत्ताच मामाकडे कशाला रहायला हवंय?

तिनं आईला मेसेज पाठवला. ‘‘लगेच घरी परत ये.’’ त्यावर आईनं उलट मेसेज दिला, ‘‘प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगण्याचा हक्क आहे बेबी, तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयात मी भक्कम तुझ्या पाठीशी आहे. मी चार दिवस माझ्या भावाकडे राहिले तर तुला काय त्रास होतोय? धिज इज नॉट फेयर. घरी सखुआजी आहेत, मीना ताई आहेत, सगळे लोक तुझ्या खाण्यापिण्याची, कपड्याची काळजी घेताहेत. तू आनंदात राहा. तुझ्या मित्रमैत्रीणींकडे जा.’’

त्या चार दिवसात लतिका वैतागली. तिच्या सगळ्याच मित्र मैत्रीणींमध्ये तिच्या डिव्होर्सची चर्चा होती. त्यातून विशेष म्हणजे वर्षभर कोर्टशिप झाल्यावर यांच्या हनिमूनमध्ये असं काय घडलं की एकदम डिव्होर्सचीच वेळ आली. तिला पार्टीत तोच अनुभव आला. सिनेमाला यायला मित्राला वेळ नव्हता. शॉपिंगला जायला मैत्रीण मोकळी नव्हती.

लतिकाला लक्षात आलं की खरंच लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलतं, नाती बदलतात, मित्रमैत्रींणीचाही दृष्टीकोन बदलतो, त्यांच्या प्रतिक्रियाही बदलतात. लग्न म्हणजे गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. तो पोरखोळ नाही. विचारपूर्वक पाऊल उचलायला हवं.

तिनं मोहितचा नंबर फिरवला अन् पलिकडून तो उत्साहानं म्हणाला, ‘‘हं बोल, कशी आहेस?’’

‘‘कसा आहेस तू?’’

त्याच्या मनातलं प्रेम एकदम उफाळून आलं. ‘‘फार दिवस झाले…तुझी खूप आठवण येतेय. आपण भेटूयात?’’

तिलाही ते जाणवलं. एकदम मोकळेपणानं म्हणाली, ‘‘मी आज पाच वाजता तुला तिथंच भेटते.’’

‘‘लग्नाआधी नेहमी आपण जिथं भेटत असू तिथंच हं!’’ मोहितनं म्हटलं.

मोहितनं आपण होऊन पुढाकार घेतल्यानं लताला खूप बरं वाटलं. आज कितीतरी दिवसांनी तिला असं प्रसन्न अन् हलकं हलकं वाटत होतं. मधल्या काही दिवसांत मनावर सतत ताण जाणवायचा. विनाकारण चिडचिड व्हायची. आज मात्र मनात फक्त प्रेम आणि प्रेमच होतं. याक्षणी तिचा कुणावर राग नव्हता. कुणाविषयी तक्रार नव्हती.

वेळेवर कॅफेत पोहोचण्यासाठी ती आवरू लागली. तेवढ्यात माहेरी गेलेली तिची आई घरी परतली. ती खूपच आनंदात होती. ‘‘लतिका एक छान बातमी आहे. मी ज्या मुलाबद्दल तुला बोलले होते ना, तो आजच रात्री जेवायला आपल्याकडे येतोय. तू घरीच राहा. तुला आवडेल तो. तुम्ही एकमेकांना पसंत केलं की आपण मोहितच्या डायव्होर्सचंही बघू अन् मग हे लग्न आणखी धूमधडाक्यात करू? ओ. के. बेबी?’’

रचनाचं बोलणं ऐकून लतिका हतबुद्ध झाली. मोहितवर ती रूसली होती…वैतागून तिनं डिव्होर्सबद्दल म्हटलंही असेल, पण मनातून तिला मोहित हवाच होता. डिव्होर्स तिच्या जिभेनं म्हटलं होतं पण मन अन् मेंदू त्यासाठी कधीच तयार नव्हते. याक्षणी तिला फार प्रकर्षानं याची जाणीव झाली होती. आता तर ती मोहितलाच भेटायला निघाली आहे?

पण आईची चूक नाहीए. ती तर लतिकाच्याच निर्णयाला पाठिंबा देते आहे.

‘‘आई, इतकी घाई का करते आहेस? जेव्हा घटस्फोट घ्यायचं नक्की होईल, तेव्हा मी सांगेन तुला. आता मी बाहेर निघालेय…जरा घाईत आहे,’’ लतिकानं म्हटलं.

‘‘हे बघ बेटू, प्रत्येक वेळी तुझ्या इच्छेनं सर्व गोष्टी घडतील, सगळ्यांनी तुझंच ऐकायचं असं नाही चालणार.’’ नेहमीच्या प्रेमळ आवाजात बोलत नव्हती रचना. चांगलाच कडक आवाज होता तिचा. ‘‘तुला मोहितशी लग्न करायचं होतं, आम्ही करून दिलं. ज्या पद्धतीनं, जे जे हवं तसंच लग्न झालं. तुझ्या इच्छेप्रमाणे वीस दिवसांचा हनीमून प्रोग्रॅम तुला गिफ्ट केला. आता तिथून परत आल्यावर तूच डिव्होर्सबद्दल बोललीस, चला ते ही आम्ही समजून घेतलं. आता डिव्होर्स घे, दुसरं लग्न कर अन् संसार थाट. आम्हालाही किती लोकांच्या किती प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात.’’

लेकीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघत होती रचना…अपेक्षित तो परिणाम होतोय हे तिच्या लक्षात आलं.

लतिकाही समजून चुकली की जो काही निर्णय घ्यायचाय तो तिला आजच घ्यायला हवा. आता थोड्या वेळात मोहित भेटतोय अन् रात्री तो दुसरा मुलगा भेटायला येतोय. आई नक्कीच लग्नाचा विषय काढेल, त्यापूर्वी लतिकानं आपला निर्णय आईला सांगायला हवा.

अगदी वेळेवर लतिका कॅफेत पोहोचली. त्यांच्या नेहमीच्याच टेबलवर मोहित तिची वाट बघत होता. त्यानं लगेच दोघांच्या पसंतीचे जिन्नस ऑर्डर केलं. दोघंही थोडी अवघडलेलीच होती.

मोहितनं पटकन् म्हटलं, ‘‘लतिका, प्लीज घरी चल, घरातली सगळी माणसं तुला मिस करताहेत. तुझी आठवण काढताहेत. आई तर रोज विचारते…अगं, कशीबशी मी तिला थोपवून धरलीय नाहीतर ती कधीची तुझ् घरी येऊन तुला घेऊन गेली असती.’’ बोलता बोलता तो भावनाविवश झाला.

पुढे तो काही बोलण्याआधीच भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत लतिकानं विचारलं, ‘‘कधी येतोस मला घ्यायला?’’

दोघंही हसली. एकमेकांचे हात हातात घेऊन घट्ट धरले. न बोलताच त्यांना एकमेकांचे विचार कळले. दोघांनाही एक वर्षाच्या कोर्टशिपमधले प्रेमाचे सगळे क्षण जसेच्या तसे आठवले. ती दोघं एकमेकांसाठीच आहेत. याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला. फक्त प्रेम परिपक्व व्हायला थोडा वेळ हवाय… आता त्यांना सगळं कळलंय.

लग्न कधीच एकतर्फी नसतं. लग्न टिकवणं ही दोघांची अन् दोन्ही पक्षांची जबाबदारी असते. त्या सायंकाळी उशिरा माहेरून सासरी निघालेल्या लतिकाला मोहितबरोबर खुशीत असलेली बघून रचनाला हसू येत होते. ‘दिल्या घरी तू सुखी राहा,’ तिचं मन आशिर्वाद देत होतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें