क्रंदन

कथा * प्राची भारद्वाज

पीयूषनं दोन्ही बॅगा विमानांत चेक इन करून स्वत: आपल्या नवविवाहित पत्नीला हात धरून आणून सीटवर बसवलं. हनीमूनवर सगळंच कसं छान छान असतं ना? नवरा आपल्या बायकोची पर्सही स्वत:च सांभाळतो. ती दमली तर तिला उचलूनही घेतो. ती उदास आहे हे जाणवलं तर खंडीभर जोक सांगून तिला हसवायला बघतो.

पीयूष आणि कोकिळाचं लग्न ठरवून झालेलं होतं. नव्या लग्नाची नव्हाळी होती. एकमेकांकडे चोरून बघणं, हळूच हसणं, हात हातात घेणं हे सगळं त्यात आलंच. हनीमूनही खूप छान झाला. एकमेकांवर प्रेमाच वर्षाव केला. एकमेकांच्या इच्छा अपेक्षा समजून घेतल्या. मतं जाणून घेऊन मान दिला. कुटुंबियांची माहिती घेतली अन् छान संसार करण्याची वचनंही दिली घेतली.

पीयूषनं हनीमून ट्रीप सर्वार्थानं यशस्वी व्हावी म्हणून खूप श्रम घेतले होते. आपला आयुष्याचा जोडीदार उत्तम आहे याबद्दल कोकिळेच्या मनांत कुठलाही संशय नव्हता. पीयूष स्वत:चं काम मनापासून करत होता. भरपूर कष्ट करायचे आणि भरपूर पैसा मिळवायचा. काम प्रामाणिकपणे करायचं अन् खोटा पैसा घ्यायचा नाही. हेच वय कष्ट करण्याचं आहे, दमलो, थकलो म्हणायचं नाही, चिडचिड करायची नाही.

कोकिळानंही त्याची कमाई प्रेमानं, अभिमानानं हातात घेतली. गरजेवर आधी खर्च करायचा. काही रक्कम शिल्लक टाकायची. उगीच मोठेपणाचा आव आणायचा नाही हे तिनं ठरवलं होतं.

एक दिवस तिची मोलकरीण उशीरा आली.

‘‘कां गं उशीर केलास?’’ तिनं विचारलं.

आपल्या अंगावरचे वळ व सुजलेला चेहरा दाखवत मोलकरीण म्हणाली, ‘‘काय करू ताई? काल नवरा पुन्हा दारू पिऊन आला अन् तमाशा केला. स्वत: कमवत नाही, मला पैसे साठवू देत नाही. माझ्या पैशानं दारू पितो, आम्हालाच मारतो.’’

‘‘पण तू सहन का करतेस? म्हणून म्हणतात थोडं शिकावं. राबराब राबून पैसा मिळवायचा अन् वर मार ही खायचा…आता नवरा छळतोय, मोठा झाला की मुलगा तेच करणार.’’ कोकिळेला मोलकरणीसाठी वाईट वाटंत होतं. त्यावर उपाय शोधायला हवा हे तिनं ठरवलं होतं.

सायंकाळी पीयूष घरी आल्यावर तिनं पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिनं त्याचा उजवा हात आपल्या पोटावर ठेवला.

‘‘खरंच कोकी?’’ आनंदून पीयूषनं विचारलं.

‘‘तू तर माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे रंग भरलेस गं! आपल्या दोघांच्या संसारात तिसरा जीव येतोय याचा मला कित्ती आनंद वाटतोय…तुला काय हवंय ते माग…मी देईन.’’ तो आनंदून म्हणाला.

‘‘मला जे हवंय ते सगळं तुम्ही मला दिलंय. आता मला काहीच नकोय.’’ कोकिळाही खूप आनंदात होती.

‘‘मला कुणी नातलग नाहीत. तुझी आता काळजी घ्यायला हवी. आपण तुझ्या आईची मदत घ्यायची का?’’ पीयूषनं विचारलं. ती दोघं कोकिळाच्या माहेरी आली. माहेर तिचं गावातच होतं.

आनंदाच्या बातमीनं कोकिळाच्या माहेरीही आईवडिल प्रसन्न झाले. आईनं तर तऱ्हेची पक्नान्नं तयार करून लेकीला जावयला जेवायला बसवलं. तेवढ्यात कोकिळाचे वडील दोन हातात दारूचे ग्लासेस घेऊन आले.

‘‘बाबा, हे काय करताय?’’ कोकिळेला राग आला. आश्चर्यही वाटलं, बाबांचं वागणं तिला आवडलं नाही.

पीयूषनं म्हटलं, ‘‘असू दे गं! त्यांनासुद्धा आजोबा होणार असल्याचा खूप आनंद द्ब्रालाय. तेच सेलिब्रेट करताहेत ते. तू शांत रहा. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.’’

पण त्यानंतर तर ही पद्धतच रूढ झाली, केव्हाही कोकिळाच्या माहेरी गेलं की सासरे जावई दारी प्यायचे. त्यामुळे कोकिळाला माहेरीही जावसं वाटेना. पण या अशा अवघडलेल्या अवस्थेत तिला माहेरची मदतही गरजेची होती.

बघता बघता कोकिळाचे दिवस भरले आणि तिनं जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा, एक मुलगी. त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. दोन्ही बाळांचं दोघं मिळून करायची. सुरूवातीला अवघड होतं पण हळूहळू सगळं सवयीचं झालं. दिवसा माझी बाळं मोठी होत होती. बाळांच्या बाळलीला दोघांना तृप्त करत होत्या. कामावरून परतल्यावर दोन्ही बाळांना खेळवणं हा पीयूषच्या आयुष्यातील आनंदाचा भाग होता. कोकिळादेखील न दमता घरकाम व बाळांचं संगोपन उत्तम करत होती.

एका सायंकाळी पीयूष बाहेरून आला तेव्हा कोकिळाला दारूचा वास आला. ती दचकली. तिनं धसकून विचारलं, ‘‘तुम्ही पिऊन आला आहात?’’

‘‘अगं, तो मोहित आहे ना. त्याचं प्रमोशन झालंय. त्यानं पार्टी दिली. सगळेच मित्र पित होते. त्यांच्या अती आग्रहामुळे…’’ पीयूष पटकन् तिथून उठला अन् आपल्या खोलीत गेला.

अन् नंतर तर रोजच पीयूष पिऊन घरी येऊ लागला. रोज नवं कारण असायचं.

कोकिळा त्रस्त झाली. मनांत अनामिक भीतीनं घर केलं. ‘‘असं कसं चालेल पीयूष? तुम्ही रोज पिऊन घरी येता. रोज कुठलं तरी कारण असतंच तुमच्यापाशी. मित्रांचं ठीक आहे हो, पण तुम्ही व्यसनी झाला आहात. सवय लागलीय तुम्हाला…इतक्या कष्टानं उभारलेला धंदा, आपला संसार सगळ्यावर त्याचा परिणाम होतोय. दारू फार वाईट असते.’’ कोकिळेला रडू फुटलं.

‘‘नाव कोकिळा, पण बोलतेस कावळ्यासारखी कर्कश्श.’’ चिडून पीयूष बोलला.

कोकिळाही चिडली. ‘‘रोजच पिऊन आल्यावर तुमचं कौतुक करायचं का?’’

रात्री दोघंही बोलले नाहीत पण सकाळी लवकर उठून पीयूषनं चहा केला. कोकिळेला उठवलं. हात जोडून तिची क्षमा मागितली, ‘‘मला क्षमा कर कोकी, तुला आवडंत नाही ना, मी आजपासून दारू सोडली. नाही पिणार यापुढे.’’

आणि खरोखर तो प्रयत्न करू लागला. त्यानं पिणाऱ्या मित्रांमध्ये मिसळणं बंद केलं. तो पार्ट्यांना जाईना. सायंकाळ तर घरातच बाळांसोबत घालवू लागला. कोकिळाला खूप आनंद झाला. आता सगळं नीट होणार हे समाधान तिला लाभलं.

एखादा आठवडाच जेमतेम झाला असेल, अमेरिकेहून पीयूषचे काका, कधी नव्हे ते आले. येताना महागाची दारूची बाटली आणली होती. कसाबसा पीयूषनं दारूवर ताबा मिळवला होता. घरात नेमकी दारूच समोर आली. त्यानं कांकाना टाळण्याचा खूप प्रयत्न केला.

‘‘काका, मी हल्ली दारू सोडली आहे. मला जरा त्रास व्हायला लागला होता,’’ पीयूषनं काकांना सांगण्याचा प्रयत्न केला. पणा काकाही आडमुठे अन् अमेरिकेत राहिल्यामुळे स्वत:ला जरा ‘मोठे’ समजणारे. त्यांनी उलट पीयूषलाच दटावलं. ‘‘कुठली तरी स्वस्त दारू पीत असशील म्हणून झाला त्रास. ही अमेरिकन महागडी दारू पिऊन बघ, मग सांग मला. आम्ही अमेरिकेत रोज दारू पितो अन् काहीही होत नाही.’’

आपला मोठेपणा मिरवण्याच्या नादात काकांना, दारू सोडणाऱ्याला माणसाला दारूचा आग्रह करू नये, एवढा पोचही नव्हता. दारू शेवटी दारूच असते. देशी काय अन् विलायती काय.

झालं! पीयूषला तेवढंच निमित्त पुरलं. काका होते तोवर रोजच दारू होती. कोकिळाचा जीव कासाविस व्हायचा. ती त्याला विनवायची, धमकी द्यायची, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. उलट एक दिवस तो तिच्यावरच चिडला.

‘‘तुला म्हणायचंय काय? कधी नव्हे ते काका आलेत, त्यांना सांगू, तुम्ही एकटेच घ्या. मी तुम्हाला कंपनी देऊ शकत नाही? तू थोडं समजून घेता, मी फक्त कंपनी देतोय. ज्या दिवशी काका जातील मी दारूकडे बघणारही नाही. तू काळजी करू नकोस. मी वचन देतो…’’

काकांचा मुक्काम एकदाचा हलला पण पीयूषची सवय गेली नाही. तो रोज पिऊनच घरी यायचा. एकदा कोकिळानं रात्री दार उघडलं नाही, ‘‘तुम्ही आपलं वचन विसरताय पण मी नाही विसरत, यापुढे पिऊन आलात तर घराबाहेरच रहा. मी दार उघडणार नाही.’’

‘‘ऐक कोकिळा, आज घरात घे मला. यापुढे मी बाहेरून पिऊन येणार नाही. घरीच घेत जाईन…मग तर चालेल ना?’’

‘‘पियूष, मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करा.’’

‘‘बरं तर, मी बाहेरच्या गॅरेजमध्ये बसून पीत जाईन.’’

कोकिळा काय बोलणार? दारूड्याला स्थळ, काळ, नाती कशाचंही भान नसतं. त्याला फक्त दारू हवी असते. नाराजीनं का होईना पण कोकिळानं त्याला गॅरेजमध्ये बसून पिण्याची परवानगी दिल्यावर तो रोज सायंकाळी गॅरेजचा दरवाजा आतून बंद करून दारू प्यायचा व जेवायला, झोपायला घरात यायचा.

त्या रात्री तो दोनदा धडपडला, त्याला तोल सावरता येत नव्हता. ‘‘पीयूष, काल रात्री तुम्ही अख्खी बाटली संपवलीत? कसं सुटणार हे व्यसन? तुम्ही पक्के दारूडे झाला आहात.’’ चिडून कोकिळानं म्हटलं.

‘‘मला माफ कर कोकिळा, आता बघ, फक्त दोन पेग…यापुढे तूच बघ…फक्त दोन पेग,’’ तो गयावया करत होता.

सकाळी उठला की पीयूष क्षमा मागायचा. रात्र झाली की दारू त्याच्यावर अंमळ गाजवायची.

त्या रात्री पुन्हा एकदा प्रंचड पिऊन घरात आला तेव्हा कोकिळाचा पारा खूपच चढला होता. तिनं त्याला खोलीत येऊ दिलं नाही. ती चिडून म्हणाली, ‘‘माझ्या अन् माझ्या मोलकरणीच्या नवऱ्यात एवढाच फरक आहे की तो तिच्या पैशानं दारू पिऊन तिलाच झोडपतो अन् माझा नवरा स्वत:च्या पैशानं दारू पिऊन गुपचुप झोपून टाकतो. पण शरीराची नासाडी दोघांच्याही होतेच अन् आमच्या संसाराचाही सत्यानाश होतोच. पीयूष, यापुढे माझ्या खोलीत यायचं नाही.’’

यावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. पीयूष दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. हळूहळू दोघांमधली दरी वाढू लागली. कोकिळा पीयूषवर खूपच नाराज होती. आता तर तिनं त्याला काही म्हणणंही सोडून दिलं होतं.

हल्ली पीयूषची तब्येत सतत बिघडत होती. तो खूप अशक्त झाला होता. डॉक्टरकडे गेला तेव्हा फार उशीर झाला होता. त्याचं लिव्हर पार कामातून गेलं होतं. डॉक्टरांनी त्याला किती तरी टेस्ट करायला लावल्या. रात्रंदिवस डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कोकिळा थकून गेली होती. पीयूषला सांभाळताना तिचं मुलांकडे दुर्लक्ष होत होतं. तिच्या मैत्रिणी तिला मदत करत होत्या.

सगळ्या तपासण्या अन् उपचाराचं बिल अठरा लाख रूपये झालं. दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका पैसा कसा उभा करणार? जमीन, सेव्हींग, सोनंनाणं सगळं विकावं लागणार.

शेयर्स व इन्शुरन्सची कागदपत्र घेऊन कोकिळा व पीयूष वकीलाकडून परतून येताना कोकिळाला रडून अनावर झालं. ‘‘पीयूष, हे काय होऊन बसलं आपल्या सुंदर संसाराचं? कुठं होतो आपण अन् आज कुठं आहोत..तुम्ही खूप आधीच सावध व्हायला हवं होतं.’’

कोकिळेची स्थिती बघून पीयूषचेही डोळे भरून आले. खरंच, किती सांगत होती कोकिळा. त्यानं तिचं ऐकायला हवं होतं. संसार, मुलं सर्वांकडे दुर्लक्ष झालं. आता काय होणार? डबडबलेल्या डोळ्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. गाडी ट्रकवर आदळली. पीयूष व कोकिळा जागच्या जागी ठार झाली.

त्यांची जुळी मुलं या जगात एकटी पडली. कोण त्यांना सांभाळणार? नावाडी जर नांव बुडवायला निघाला तर नावेत बसणाऱ्यांच्या जिवाची काळजी कोण घेणार?

आवाज उठवलाच पाहिजे…

कथा * अर्चना पाटील

‘‘उद्या लवकर ये.’’

‘‘का?’’ हयातने विचारले.

‘‘उद्यापासून रिहानसर येणार आहेत आणि आपले जुने सर रिटायर होत आहेत.’’

‘‘प्रयत्न करेन,’’ हयातने उत्तर दिले, परंतु तिला स्वत:ला माहीत नव्हते की ती वेळेवर येऊ शकेल की नाही.

दुसऱ्या दिवशी रिहानसर शार्प १० वाजता ऑफिसमध्ये पोहोचले. हयात आपल्या खुर्चीवर नव्हती. रिहानसर येताच सर्वांनी उभे राहून गुड मॉर्निंग केले.

रिहानसरांच्या नजरेतून ती खाली खुर्ची सुटली नाही.

‘‘इथे कोण बसते?’’

‘‘मिस हयात, तुमची असिस्टंट, सर,’’ क्षितिजने उत्तर दिले.

‘‘ओके, त्या आल्या की लगेच त्यांना आत पाठव.’’

रिहान लॅपटॉप उघडून बसला होता. कंपनीचे रेकॉर्ड्स तो चेक करत होता. बरोबर १० वाजून ३० मिनिटांनी हयातने रिहानच्या केबिनचा दरवाजा ठोकला.

‘‘मे आय कम इन सर…’’

‘‘येस प्लीज, आपण कोण?’’

‘‘अं…मी हयात आहे, आपली असिस्टंट.’’

‘‘मला आशा आहे की उद्या सकाळी मी जेव्हा येईन, तेव्हा आपली खुर्ची रिकामी नसेल. आपण जाऊ शकता.’’

हयात नजर झूकवून केबिनच्या बाहेर आली. रिहानसरांसमोर जास्त बोलणे योग्य नाही, ही गोष्ट हयातच्या लक्षात आली होती. थोड्याच वेळात रिहानने ऑफिस स्टाफची एक मिटिंग घेतली.

‘‘गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. माझी आपणाकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की उद्यापासून कंपनीचे सर्व कर्मचारी वेळेवर येतील आणि वेळेवर जातील. ऑफिसमध्ये आपली पर्सनल लाइफ सोडून कंपनीच्या कामाला आधी प्रायोरिटी देतील. मला आशा आहे की आपल्यापैकी कोणीही मला तक्रारीची संधी देणार नाही. बस एवढेच, आता आपण सर्व जाऊ शकता.’’

‘‘किती खडूस आहे, एक-दोन लाइन जास्त बोलला असता, तर आकाश खाली आले असते की धरती फाटली असती,’’ हयात मनातल्या मनात रिहानला दोष देत होती.

नवीन बॉसचा मूड पाहून प्रत्येक जण कामाबाबत जागरूक झाला. दुसऱ्या दिवशी रिहान पुन्हा ऑफिसमध्ये शार्प १० वाजता दाखल झाला आणि आज पुन्हा हयातची चेअर खाली होती. रिहानने पुन्हा क्षितिजला मिस हयात आल्यावर केबिनमध्ये पाठविण्याची सूचना दिली. ठीक १० वाजून ३० मिनिटांनी हयातने रिहानच्या केबिनचा दरवाजा ठोठावला.

‘‘मे आय कम इन सर.’’

‘‘हो जरूर, मी तुमचीच वाट पाहात होतो. आता आपल्याला एका हॉटेलमध्ये मिटिंगसाठी जायचे आहे. तुम्ही तयार आहात का?’’

‘‘हो, कधी निघायचे आहे?’’

‘‘त्या मिटिंगमध्ये तुम्हाला काय करायचे आहे?’’

‘‘अं… तुम्ही मला काल सांगितले असते, तर मी तयारी करून आले असते.’’

‘‘मी आता तुम्हाला सांगणारच होतो, पण बहुतेक वेळेवर येण्याची आपल्याला सवय नाहीए. तुमची सॅलरी किती आहे?’’

हयात काही बोलत नव्हती. ती केवळ नजर झाकवून इकडे-तिकडे बघत होती. रिहान आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला. रिहान हयातच्या अगदी जवळ उभा होता. हयात मनातल्या मनात प्रार्थना करत होती की तिची लवकरात लवकर रिहानच्या केबिनमधून सुटका व्हावी.

‘‘तुम्ही तुमची सॅलरी सांगण्याचे कष्ट घेणार आहात का?’’

‘‘अं… ३०,०००/-’’

‘‘जर तुमच्याकडे कंपनीसाठी वेळ नाहीए, तर तुम्ही घरी जाऊ शकता आणि तुमच्यासाठी ही शेवटची ताकीद आहे. घ्या फाइल्स, आपल्याला आता निघायचे आहे.’’

हयात रिहानसोबत हॉटेलमध्ये पोहोचली. आज एका हैदराबादी कंपनीसोबत मिटिंग होणार होती. रिहान आणि हयात दोघेही वेळेवर पोहोचले. परंतु समोरच्या पार्टीने बुके पाठवून आज आपण येणार नसल्याचा मेसेज आपल्या कर्मचाऱ्यासोबत पाठवला. तो कर्मचारी जाताच रिहानने तो बुके  उचलला आणि रागाने हॉटेलच्या गार्डनमध्ये फेकून दिला. ‘‘आजचा दिवसच बेकार आहे,’’ असे म्हणत तो आपल्या गाडीत येऊन बसला. रिहानचा राग पाहून हयात थोडीशी त्रासली आणि घाबरून गाडीत बसली. ऑफिसमध्ये पोहोचताच रिहानने हैदराबादी कंपनीसोबत आधी केलेल्या कॉन्ट्रॅक्ट्सचं डिटेल्स मागितले. या कंपनीसोबत तीन वर्षांपूर्वी एक कॉन्ट्रॅक्ट झाले होते. परंतु तेव्हा हयात इथे काम करत नव्हती. या कंपनीच्या बाबतीत कोणतीही माहिती ती रिहानला सांगू शकत नव्हती.

‘‘मिस हयात, तुम्ही संध्याकाळी फाइल देणार आहात का मला?’’ रिहान केबिनबाहेर येऊन हयातवर ओरडत होता.

‘‘अं…सर, ती फाइल मिळत नाहीए.’’

‘‘मिळत नाही म्हणजे… तुम्ही कोणतेही काम नीट करू शकत नाही. जोपर्यंत फाइल मिळणार नाही, तुम्ही घरी जायचे नाही.’’

हे ऐकताच हयातचा चेहरा उतरला. तसेही सर्वांसमोर ओरडा मिळाल्याने हयातला खूप इन्सल्टिंग वाटत होते. संध्याकाळचे ६ वाजले होते. फाइल मिळाली नव्हती. सर्वजण घरी जायला निघाले होते. हयातच्या बसची वेळ झाली होती. हयात हिंमत करत रिहानच्या केबिनमध्ये गेली.

‘‘सर, फाइल मिळत नाहीए.’’

रिहान काहीही बोलत नव्हता. तो कॉम्प्युटरवर काम करत होता. रिहानच्या गप्प राहण्यामुळे हयात आणखी त्रस्त होत होती. रिहानचे वागणे पाहून ती केबिनच्या बाहेर आली आणि आपली पर्स उचलून घरी निघाली. दुसऱ्या दिवशी हयात रिहानच्या अगोदर ऑफिसमध्ये हजर होती. हयातला पाहताच रिहान म्हणाला, ‘‘मिस हयात, आज तुम्ही गोडावूनमध्ये जा. आपल्याला आज माल पाठवायचा आहे. आय होप हे तरी काम तुम्ही व्यवस्थित कराल.’’

हयात काही न बोलता मान खाली घालून निघून गेली. ३ वाजेपर्यंत कंटेनर आलेच नाहीत. ३ वाजल्यानंतर कंटेनरमध्ये कंपनीचा माल भरायला सुरुवात झाली. रात्री ८ वाजेपर्यंत काम चालू राहिले. हयातची बसही निघून गेली. रिहान आणि त्याचे वडील कंपनीतून बाहेर पडत होते की कंटेनर पाहून तेही गोदामाच्या दिशेने वळले. हयात एका टेबलाजवळ बसली होती आणि रजिस्टरमध्ये काहीतरी लिहीत होती. गोडावूनचा वॉचमन बाहेर उभा होता. गोडावूनमधील शांततेमुळे हयातला भीती वाटत होती, पण आज काम पूर्ण केल्याशिवाय ती घरीही जाऊ शकत नव्हती, हे हयातला चांगले माहीत होते. इतक्यात, रिहान मिझा साहेबांसोबत गोडावूनमध्ये आला. हयातला तिथे पाहून रिहानलाही काहीतरी चूक झाल्याची जाणीव झाली.

‘‘हयात, बेटा, अजून तू घरी गेली नाहीस?’’

‘‘नाही सर, बस आता निघतेच आहे.’’

‘‘असू दे, काही हरकत नाही. ये, आम्ही तुला सोडतो.’’

आपल्या वडिलांचे हयातशी एवढे प्रेमळपणाचे वागणे पाहून रिहानला आश्चर्य वाटत होते, पण तो काही बोलतही नव्हता. रिहानचे तोंड पाहून हयातने, ‘‘नाही सर, मी जाईन.’’ असे बोलून त्यांना टाळले. हयात बसस्टॉपवर उभी होती. मिझासरांनी पुन्हा हयातला गाडीत बसण्याची विनंती केली. यावेळी हयात नाही म्हणू शकली नाही.

‘‘तू कुठे उतरणार?’’

‘‘अं… मला सिटी हॉस्पिटलमध्ये जायचे आहे.’’

‘‘सिटी हॉस्पिटलमध्ये का? सर्वकाही ठीक तर आहे ना?’’

‘‘खरे तर माझ्या बाबांना कॅन्सर आहे, त्यांना तिथे अॅडमिट केले आहे.’’

‘‘मग तर तुझ्या बाबांना आम्ही भेटलेच पाहिजे.’’

थोड्याच वेळात हयात आपले मिझासर आणि रिहानसोबत आपल्या वडिलांच्या खोलीत गेली.

‘‘ये, ये हयात बेटा. किती काम करतेस आणि आज यायला एवढा उशीर का केलास? तुझ्या त्या नवीन बॉसने आज पुन्हा तुला त्रास दिला का?’’

हयातच्या बाबांचे बोलणे ऐकून हयात आणि रिहान दोघांचेही चेहरे पांढरे पडले.

‘‘पुरे हा बाबा, किती बोलता तुम्ही. आज तुम्हाला भेटायला माझ्या कंपनीचे बॉस आले आहेत. हे आहेत रिहानसर आणि त्यांचे वडिल मिझार्सर.’’

‘‘तुम्हाला भेटून खूप बरे वाटले, सुलतान महाशय. आता कशी तब्येत आहे तुमची?’’

‘‘माझ्या हयातमुळे कसातरी जीव जगतोय. बस आता लवकरात लवकर एखाद्या चांगल्या घरात हिचे लग्न झाले की मी चिरनिद्रा घ्यायला मोकळा झालो.’’

‘‘सुलतान महाशय, काळजी करू नका, हयातला आपल्या घराची सून करून घेणे ही कुठल्याही खानदानासाठी अभिमानाची गोष्ट असेल. ठीक आहे, मग आम्ही निघतो.’’

या रात्रीनंतर रिहान हयातसोबत थोडेसे मैत्रीपूर्ण वागू लागला. हयातही आता रिहानबाबत विचार करत असे. रिहानला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी नटूनथटून येऊ लागली होती.

‘‘काय झाले, आज खूप सुंदर दिसतेस?’’ रिहानचा छोटा भाऊ आमीर हयातच्या समोर येऊन बसला. हयातने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि मग आपल्या फायलीत डोके खुपसले. आमीर तिच्या टेबलाच्या समोरच्या खुर्चीवर बसून तिला निरखून पाहात होता. शेवटी कंटाळून हयातने फाइल बंद केली आणि टेबलावर आपले दोन्ही हात डोक्याला लावून डोळे बंद करून आमीरच्या उठण्याची वाट पाहू लागली. इतक्यात, रिहान आला. हयातला आमीरच्या समोर अशा प्रकारे पाहून तो त्रस्त तर झाला, पण त्याने पाहूनही न पाहिल्यासारखे केले.

दुसऱ्या दिवशी रिहानने आपल्या केबिनमध्ये एक मिटिंग ठेवली होती. त्या मिटिंगमध्ये आमीरला रिहानच्या बाजूला बसायचे होते, पण तो जाणीवपूर्वक हयातच्या बाजूला येऊन बसला. हयातला त्रास देण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. परंतु हयात प्रत्येक वेळी त्याला पाहूनही न पाहिल्यासारखे करत होती. एके दिवशी तर हद्दच झाली. आमीर ऑफिसमध्ये हयातच्या वाटेत उभा राहिला.

‘‘रिहान तुला महिन्याला तीस हजार देतो, मी एका रात्रीचे देईन. आता तरी तयार हो ना…’’

ही गोष्ट ऐकताच हयातने आमीरच्या एक जोरदार कानशिलात लगावली. ऑफिसमध्ये सर्वांच्या समोर हयात अशाप्रकारे रिअॅक्ट होईल, या गोष्टीची आमीरला मुळीच अपेक्षा नव्हती. हयातने कानशिलात तर लगावली, पण आता तिची नोकरी गेली, हेही तिला माहीत होते. सर्वकाही रिहानच्या समोर घडले होते. मात्र आमीर असे काय म्हणाला की हयातने त्याच्या कानशिलात लगावले, ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही. हयात आणि आमीर दोघेही ऑफिसमधून निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आमीर येताच आधी रिहानच्या केबिनच्या दिशेने गेला.

‘‘दादा, मी या मुलीला एक दिवसही इथे सहन करून घेणार नाही. तू आत्ताच्या आत्ता तिला कामावरून काढून टाक.’’

‘‘मी काय करायला हवे, ते मला माहीत आहे. जर चूक तुझी असेल, तर तुलाही कंपनीतून फायर करेन, छोटे बंधुराज. ही गोष्ट लक्षात ठेव.’’

‘‘त्या मुलीसाठी तू मला काढून टाकणार?’’

‘‘का नाही…’’

‘‘ही तर हद्दच झाली. ठीक आहे, मग मीच जातो.’’

हयात रिहान तिला कधी आत बोलावतोय, याचीच वाट पाहात होती. शेवटी रिहानने तिला बोलावलेच. रिहान आपल्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी पाहात होता. हयातला त्याच्यासमोर उभे राहून दोन मिनिटे झाली. शेवटी हयातने बोलायला सुरुवात केली.

‘‘मला माहीत आहे, तुम्ही मला इथे फायर करण्यासाठी बोलावले आहे. तसेही तुम्ही माझ्यावर खूश नव्हता. तुमचे काम सोपे झाले. पण माझी काहीही चूक नाहीए, तरीही तुम्ही मला काढून टाकताय, ही गोष्ट माझ्या लक्षात राहील.’’

रिहान अचानक उभा राहून तिच्याजवळ आला, ‘‘आणखी काही…’’

‘‘अं… नाही…’’

‘‘तसे आमीरने काय केले होते?’’

‘‘म्हणत होते की एका रात्रीचे तीस हजार देतो.’’

आमीरचे हे विचार ऐकून रिहानला धक्का बसला.

‘‘मग मी जाऊ?’’

‘‘मुळीच नाही, तुम्ही जे काही केलंत, ते योग्यच केलंत. जेव्हाही एखादा मुलगा आपली मर्यादा विसरतो, मुलीचा नकार समजून घेत नाही, मग तो बॉस असो, पिता असो, बॉयफ्रेंड असो, त्याच्याशी असेच वागले पाहिजे. मुलींनी छेडछाडी विरूद्ध आवाज उठवलाच पाहिजे. मिस हयात तुम्हाला नोकरीवरून काढले जात नाहीए.’’

‘‘धन्यवाद.’’

आता हयातच्या जिवात जीव आला. रिहान तिच्याजवळ येत होता आणि हयात मागे-मागे जात होती. हयातला काही कळेना.

‘‘मिस हयात, तुम्ही खूप सुंदर आहात. जबाबदाऱ्याही चांगल्याप्रकारे पार पाडता आणि एक सशक्त महिला आहात. त्यामुळे मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे.’’

हयातने लाजून होकार दिला.

सरिता

कथा * देवेंद्र माने

ती माझ्या अगदी समोरून निघून गेली. ही अशी…अन् अगदी अकस्मात! तिने खरं तर मला बघितलंही असावं पण अजिबात न बघितल्यासारखं करून ती निघून गेली. जणू मी कुणी परका, अनोळखी माणूस होतो. जणू आम्ही कधी भेटलोच नव्हतो…पण माझा तिच्यावर कोणताच, कसलाच हक्क नव्हता. मी कसा काय तिला अडवणार होतो? विचारावं वाटलं होतं, कशी आहेस? काय करतेस हल्ली? पण…न जाणो तिला माझं दिसणं हा अपशकून वाटला असेल…मी दिसल्यामुळे उरलेला दिवस वाईट गेला असेल…कशाला हा दिसला असंही वाटलं असेल…

ही तीच मुलगी होती. म्हणजे पूर्वीची मुलगी. आता एक विवाहित स्त्री, कुणाची तरी पत्नी. पण जेव्हा प्रथम मी भेटलो तेव्हा ती एक सुंदर मुलगी होती. माझ्या भेटीसाठी आतुरलेली, मला भेटल्याशिवाय चैन न पडणारी.

आम्ही प्रथम भेटलो तो दिवस मला अजून आठवतो. तिने कॉलेजच्या पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतलं होतं. मी दुसऱ्या वर्षांला होतो. नव्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्याची फार वाईट पद्धत त्या काळात होती. सीनिअर्सने तिला एकटीला गाठलं अन् तिला आय लव्ह यू म्हणायला सांगितलं. तिने नकार दिला. मग तिला बियर प्यायला सांगितलं. तिने पुन्हा नकार दिला. मग म्हणाले, सलवार किंवा  कमीज (टॉप) यापैकी एक काही तरी काढ. तिने मान खाली घालून पुन्हा नकार दिला, मग सीनियर्स संतापले, चेकाळले त्यांनी तिला थोबाडायला सुरूवात केली.

ती जोरजोरात रडायला लागली. एकेक जण यायचा, गालावर मारून जायचा. मी तिच्या जवळ गेलो. ती संताप, लज्जा अन् अपमानाने थरथरत होती. अश्रू ओघळत होते. मी तिच्या समोरून तिला हातही न लावता निघून गेलो. मुलांनी तिचे कपडे फाडायचाही प्रयत्न केला, पण मी काही सज्जन पण दांडगट मित्रांच्या मदतीने त्यांना हुसकून लावलं. ती बेशुद्ध पडली होती. मी तिला इस्पितळात पोहोचवलं. कॉलेजातून तिचा पत्ता, फोन नंबर मिळवून तिच्या घरच्यांना कळवलं.

तिचे वडील शहरातले फार मोठे व्यावसायिक होते. त्यांनी सरळ पोलिसात तक्रार केली. त्यांच्या पोलिसात, राजकारणी लोकात भरपूर ओळखी होत्या. त्यामुळे पोरं घाबरली, सरळ धावत इस्पितळात पोहोचली. वडिलांसमोर मुलीची क्षमा मागितली. चक्क पाय धरले. विषय तिथेच संपला.

तिच्या वडिलांनी माझे आभार मानले. गरिबाचे आभार मानताना त्याला पैसे दिले जातात. ‘प्रेमाने देतोय, नाही म्हणू नकोस’ असं म्हटलं जातं. मला तर पैशांची नितांत गरज होती. मी पैसे घेतले. एक कोट्यधीश व्यावसायिक, समाजात मानसन्मान, राजेशाही बंगला, दारात चमचमत्या चारपाच मोटारी, गेटपाशी वॉचमन. हे सगळं बघून खरं तर मी दबून गेलो. पार बुडालो.

कॉलेजच्या मुलांना ती कोण आहे हे आधी ठाऊक असतं तर हा प्रकार घडलाही नसता. त्यानंतर मात्र सगळेच तिच्याशी व्यवस्थित वागू लागले. पण ती मात्र कुणालाही भाव देत नव्हती फक्त माझ्याशीच बोलायची. सुरुवात तिनेच केली.

‘‘हॅलो, मी सरिता,’’ तिने हात पुढे केला.

‘‘मी देवदत्त,’’ मीही हात पुढे केला.

दोन हात एकमेकांत गुंफले. चार डोळे एकमेकांना भेटले. माझ्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले. हळूहळू आम्ही एकमेकांचे जिवलग झालो. एकमेकांना फोन करत होतो. मेसेजेसची देवाणघेवाण करत होतो. आम्ही प्रेमात सगळं जग विसरलो होतो.

कॉलेजची ट्रिप एका हिलस्टेशला जाणार होती. माझी गरिबी…मी पैसे भरू शकत नाही म्हणून मी ट्रिपला जायला नकार दिला. पण तिने माझे पैसे भरले अन् मला ट्रिपला जावंच लागलं.

तिथल्या रम्य वातावरणात आम्ही दोघंच तळ्याकाठी बसलो असताना तिने म्हटलं, ‘‘मी प्रेम करते तुझ्यावर, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही.’’

‘‘प्रेम मीही करतोय तुझ्यावर…पण याचे परिणाम काय होतील याचा विचार केलाय?’’

‘‘परिणाम काय असणार? सगळ्यांचं जे होतं तेच?’’

‘‘मी फार गरीब आहे.’’

‘‘म्हणून काय झालं?’’

‘‘तुझ्या वडिलांना विचारून बघ…’’

‘‘कमाल करतोस, प्रेम मी केलंय, लग्न मला करायचंय, आयुष्य माझं आहे, मीच ते जगणार आहे तर यात माझ्या वडिलांचा संबंध कुठे येतो?’’

‘‘तेही वडिलांनाच विचार.’’

ती एकदम चिडली. मी तिला समजावलं, तिचा रुसवा काढला. किती प्रयत्न केले तेव्हा ती खळखळून हसली. स्वच्छ खळखळणाऱ्या गंगेप्रमाणे पवित्र भासली ती मला.

त्यानंतर आमचं प्रेम वाढतच गेलं. आमच्या भेटी वाढल्या. सगळ्या कॉलेजात आमच्या प्रेमाचीच चर्चा होती. कित्येक मुलं माझ्यावर जळायची.

‘‘मला तुझ्या घरी घेऊन चल,’’ एक दिवस सरिताने मला म्हटलं, ‘‘तुझ्या घरातल्यांशी माझी ओळख करून दे.’’

मी एकदम घाबरलोच! माझी गरिबी बघून तिला काय वाटेल? ती माझ्यापासून फारकत घेईल का? घरात विधवा आई अन् लग्नाच्या वयाची असूनही केवळ पैसे नाहीत म्हणून लग्न न झालेली बहीण आहे. दोन खोल्यांचं विटामातीचं घर. वैधव्य, गरिबी, हतबलता यामुळे कायम चिडचिड करणारी अन् करवादून बोलणारी आई. तिच्या कष्टामुळे शिकत असलेला मुलगा नोकरी करून पैसा मिळवेल याच एका आशेवर आहे ती अन् मी…? बहिणीच्या लग्नाआधी स्वत:चंच लग्न ठरवलं हे बघून तिला काय वाटेल?

सरिता हटूनच बसली. शेवटी मी तिला घरी आणली. ती आईला भेटली, बहिणीला भेटली. छान बोलली. आईने गोडाचा शिरा केला, बहिणीने चहा केला. निरोप घेऊन सरिता निघून गेली. आई मात्र त्यानंतर गप्प गप्प होती. ती बोलली जरी नाही तरी मला सर्व समजलं. मला लवकरात लवकर नोकरी केली पाहिजे. बहिणीचं लग्न करायचं आहे. माझ्या जबाबदाऱ्या आहेत या, त्यानंतर इतर गोष्टी. मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. पण मला यश येत नव्हतं. सतत नकार मिळाल्याने माझं मन आता अभ्यासासाठी लागत नव्हतं. मला फार असहाय वाटत होतं. एकच उपाय होता, मी सरिताशी लग्न करून घरजावई व्हायचं अन् या गरिबीतून कायमचं मुक्त व्हायचं. पण स्वाभिमान आडवा येत होता.

सरिता कोट्यधीश बापाची एकुलती एक कन्या होती. प्रेमात आकंठ बुडाल्यामुळे ती महालातून झोपडीतही येऊन राहायला तयार होती. ती मला झोपडीतून राजमहालातही घेऊन जायला तयार होती. पण काय करू ते मलाच समजत नव्हतं. एका पवित्र खळाळत्या स्वच्छ नदीला मी माझ्या गरिबीच्या दलदलीत आणून सोडू? ती किती दिवस हे सहन करेल? प्रेमाची धुंदी उतरल्यावर ती माझ्याजवळ या गरिबीत राहू शकेल? पण तिला इतकं करायला लावण्याचा मला काय हक्क आहे? तिच्या घरी जाऊन घरजावई म्हणून राहू? पण स्वाभिमान तसं करू देत नव्हता. आईचा एकमेव आधार मी होतो. आईला काय वाटेल?

‘‘तुझी अडचण काय आहे?’’ सरिताने विचारलं.

‘‘मला दोन्ही चालणार आहे. एक तर तू तुझ्या गरिबीतून बाहेर पड, नाहीतर मला येऊ दे तुझ्या घरात. मला फक्त तू, तुझी सोबत हवीय. गरीब, श्रीमंत, महाल, झोपडी, कशानेच फरक पडणार नाही. तू तिथे मी. तुझ्याशिवाय मला महालात स्वास्थ्य नाही.’’

मी गप्प होतो.

‘‘तू बोलत का नाही?’’ वैतागून तिने विचारलं.

‘‘काय बोलू? मला थोडा वेळ दे…’’

वेळ तर झपाट्याने पुढे जात होता. कॉलेज संपलं. मी नोकरी शोधत होतो. मला कुठेही, कसलीही नोकरी मिळेना. सरिता भेटायची, फोनवर बोलायची. मी खरं तर पार मोडून पडलो होतो. अन् सरिताने लग्नाचा धोशा लावला होता. तिच्या प्रेमाचा हक्कच होता तो.

सरिताचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिने तिच्या वडिलांशी माझ्या बाबतीत बोलून ठेवलं. मला म्हणाली, ‘‘बाबांनी घरी बोलावलंय. त्यांना काही बोलायचं आहे.’’

मी त्या अवाढव्य बंगल्यापुढे उभा होतो. आत दांडगी अल्सेशियन कुत्री भुंकत होती. मला बघून दरवानाने दार उघडलं.

बाहेरच्या हिरवळीवरच सरिताचे बाबा चहा घेत होते. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी बसण्याची खूण केली. तेवढ्यात नोकर माझ्यासाठी चहा घेऊन आला. मी भेदरून बसलो होतो. आपण किती खुजे आहोत या जाणीवेने मी खूपच नव्हर्स झालो होतो.

त्यांनी दमदार आवाजात विचारलं, ‘‘काय हवंय?’’

‘‘नाही…काहीच नाही,’’ मी कसाबसा बोललो.

‘‘सरिताशी लग्न करण्याची हिंमत आहे?’’

‘‘न…नाही.’’

‘‘घरजावई व्हायची तयारी आहे?’’

‘‘नाही….’’

‘‘मग पुढे काय ठरवलंय?’’

मी गप्प.

‘‘लग्न तू करू शकत नाहीस. तुला नोकरीही मिळत नाही. गरीब घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आयुष्य संपेल तुझं. माझ्या पोरीचं कसं व्हायचं? तू तिला नाही म्हण…उगाचच वेळ घालवून तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नकोस.’’

मी गप्पच होतो. काय बोलणार?

‘‘तू तर तुझा आत्मविश्वासही घालवून बसला आहेस. हे बघ देव, एक तडजोड सुचवतो. वाटल्यास त्याला सौदा म्हणूयात.’’

मी मान खाली घालून बसलो होतो. त्यांच्याकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं.

‘‘माझ्या मित्राच्या कंपनीत तुला सुपरवायझर म्हणून नोकरी देतो. बहिणीच्या लग्नासाठी बिनव्याजी कर्जही देतो. पगार भरपूर आहे. तझ्या आईला बरं वाटेल. तिचे पांग फेडल्यासारखं होईल. फक्त तुला सरितापासून दूर व्हावं लागेल.’’

मला नोकरी लागली. बहिणीच्या लग्नासाठी पैसेदेखील मिळाले. म्हातारी, कातावलेली, थकलेली आई जरा हसऱ्या चेहऱ्याने बोलू लागली.

सरिताला त्यानंतर मी भेटलो नाही. काही दिवस माझी बदली दुसऱ्या शहरात झाल्याने सरिताशी संपर्कच झाला नाही. वडिलांनी तिला सांगितलं की त्याने जबाबदारी अन् प्रेम यापैकी जबाबदारीला अधिक महत्त्व दिलं. त्याला घरजावई म्हणून राहायचं नव्हतं. तेव्हा तू त्याला विसर.

आज इतक्या वर्षांनंतर सरिता अशी जवळून निघून गेली, पुसटशी ओळखही तिने दाखवली नाही तेव्हा मी जबाबदाऱ्यांची काय किंमत दिलीय हे मला जाणवलं.

तिच्या मागेच माझा कॉलेजचा मित्र दिसला. रॅगिंग मास्टर समर खोत. ‘‘अरे देव, कसा आहेस?’’

‘‘मी बराय, तू सांग.’’

‘‘माझं छान चाललंय…मजेत आहे मी…’’

‘‘अरे मी कुणा कपाडिया, एस. नामक व्यक्तिला भेटायला आलोय.’’

तो मनमोकळे हसला. ‘‘अरे मीच कपाडिया एस. समर कपाडिया. मीच बोलावलंय तुला.’’

मी चकित! ‘‘कसं शक्य आहे? तू तर समर खोत आहेस. फिरकी घेतोस काय?’’

त्याने मला कॉफी घ्यायला चल म्हटलं. मी एजंट होतो. तो माझा क्लायंट होता. त्याच्याबरोबर जाणं क्रमप्राप्त होतं.

समरने कॉफी मागवली. मग मी फॉर्म काढले. त्याला विचारून फॉर्म भरू लागलो. नॉमिनेशनमध्ये सरिता कपाडिया नाव आलं अन् माझा हात थबकला.

‘‘माझ्या हातावर थोपटत समरने म्हटलं, ‘‘तू नकार दिल्यामुळे सरिता पार बावरली होती. सैरभैर झाली होती. कापलेल्या पतंगासारखी अवस्था झाली होती तिची. मीही मध्यमवर्गीयच होतो. मला थाटामाटाचं, श्रीमंती आयुष्य जगायचं होतं. असं समज, तो कापलेला पतंग मी लुटला. मी तिच्या वडिलांना भेटलो. घरजावई व्हायला तयार झालो. सरिताला प्रेमाने बोलून, समजावून नव्याने आयुष्य जगायला उद्युक्त केलं. तिने सावरावं म्हणून अतोनात प्रयत्न केलेत. खरं तर मीही तिच्यावर प्रेम करत होतो. पण ती तुझ्या प्रेमात असल्याने मी गप्प होतो. माझं प्रेम, माझे कष्ट यामुळे ती सावरली. तिच्या वडिलांची अट मान्य करून मी आडनाव अन् जातही बदलली. तिला प्रेमाने जिंकलंच, तिच्या वडिलांची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकाप्रमाणे मानून त्यांनाही जिंकलं. आज माझ्याजवळ सरिता आहे. मानसन्मान, पैसाअडका सगळंच आहे. मीच कपाडिया शेठ.’’

तेवढ्यात सरिता तिथे आली. मला बघून म्हणाली, ‘‘हे इथे कसे?’’

‘‘बऱ्याच दिवसांपासून पॉलिसी घ्यायला फोन करत होता. मी ओळखलं त्याला, पण त्याने मला ओळखलं नाही.’’

सरिता म्हणाली, ‘‘कसे ओळखणार? तुम्ही तर आडनाव, जात सगळंच बदललं. प्रेमात जात, धर्म काहीच आडवं येत नाही…’’

समर हसला. त्याने सरिताने मारलेला टोमणा सहज पचवला.

‘‘देव, घरी सगळे कसे आहेत?’’

‘‘आई मागेच वारली.’’

‘‘तुझी बायको, मुलं?’’

‘‘लग्न नाही केलं मी. बहीण विधवा होऊन दोन मुलांसकट माहेरी परत आली. आता त्यांचंच सगळं करतो आहे. सुपरवायझरची नोकरी सोडून दिली; कारण ती उपकाराच्या ओझ्याखाली काम करण्याची जाणीव देत होती. आता विमा एजंट झालोय. दिवसरात्र तुझ्यासारखे कस्टमर क्लायंट शोधत असतो.’’

‘‘जी माणसं आयुष्यात योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, मोठे निर्णय घेताना कचरतात त्यांचं आयुष्य असंच जायचं,’’ सरिताने म्हटलं. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

जुनं प्रेम पुन्हा उफाळून येऊ नये म्हणून समरने घाई केली. ‘‘चल सरिता, आपल्याला निघायला हवं. देव, उद्या भेटतो तुला. हे काम तुझं झालं म्हणून समज.’’ अन् तो सरितासोबत निघून गेला.

घरजावई न होण्याचा स्वाभिमान दाखवून मी काय मिळवलं? जे मिळवलं त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक घालवलं. सरिता शेवटी सागराला मिळाली. वर वर ती सुखी दिसली तरी ती तृप्त नाही हे मला कळत होतं. केवळ माझ्यामुळे ती दु:खी आहे ही सल माझ्या मनात नेहमीच राहील.

अशी केली युक्ती

मिश्किली * पारुल पारवे

‘‘प्रिया, कुठं आहेस तू? जरा चाखून बघ आणि सांग बरं, भाजी कशी झाली आहे?’’ सासूबाईंची अशी हाक ऐकली की माझी भीतिनं गाळण उडते. अगदी निर्मनुष्य रस्त्यावर एखाद्या जुनाट पडक्या हवेलीतून काही आवाज ऐकल्यावर एकट्या वाटसरूची कशी अवस्था होईल तशी माझी अवस्था होते. म्हणजे माझ्या सासूबाई चेटकिणीसारख्या भेसूर, विद्रूप वगैरे नाहीएत. त्या छान गोऱ्यापान, सुंदर, नीटनेटक्या, थोडक्यात म्हणजे सुनेला चॅलेंज देणाऱ्या मॉडर्न सासूबाई आहेत.

आता तुम्ही म्हणाल, मग एवढं घाबरण्याचं कारण काय? घाबरायला होतं त्यांच्या स्वयंपाकामुळे, होय स्वयंपाकामुळेच निसर्गानं त्यांना रूप, सौंदर्य भरभरून दिलं, पण स्वयंपाकाची कला अजिबातच दिली नाही. माहेरी सुंदर म्हणून खूप कौतुक झालं. स्वयंपाकघरात कधी पाय ठेवला नाही. स्वयंपाक कधी केलाच नाही. सासरी सौंदर्याचं कौतुक नव्हतं. झपकन स्वयंपाक करावा लागला. पण त्यांनी काय शिजवलं अन् घरातल्यांनी काय खाल्लं याचा कधी ताळमेळ बसला नाही.

घरातली पुरूष मंडळी उगीच वाद घालत बसली नाहीत. त्यांनी घरातल्या जेवणाचा अनादर करायचा नाही म्हणून पहिलं वाढलेलं जेमतेम संपवून हात धुण्याचा मार्ग निवडला…मग उदर भरण्यासाठी बाहेर हॉटेल्स, रेस्टॉरंट, टपऱ्या, धाबे असं खूप काही असतंच, पण घरात अजून एक सदस्य आहे ज्यांना सासूबाईंचं रूप काय, रांधणं काय, काहीच आवडलं नाही. या म्हणजे माझ्या दुसऱ्या सासूबाई. नाही नाही गैरसमज नको. माझे सासरे खूपच सज्जन आहेत. त्यांचं एकच लग्न झालंय. या दुसऱ्या सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या थोरल्या जाऊ. म्हणजे माझ्या सासूबाईच झाल्या ना! यांना माझ्या सासूचं पाककौशल्य अजिबात आवडत नाही. त्या म्हणतात, ‘‘कधी आपल्यासारख्या फक्क गोऱ्या भाज्या करते, म्हणजे तिखट, हळद, मसाले काहीच न वापरता भाज्या करते तर कधी सूड उगवल्यासारख्या काळ्या ठिक्कर…म्हणजे भाज्या जाळून ठेवते…एकूण स्वयंपाक बेचवच!’’

आता या घरातली सध्या तरी मी एकुलती एक सून. त्यातून नाव प्रिया. मला सगळ्यांची प्रिय बनून राहणं भाग आहे. सुरूवातीला मी दोघींनाही खुश ठेवण्यासाठी त्या म्हणतील तसं करायची. परिणाम असा झाला की एकीचं ऐकलं की दुसरीला वाटे मी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानांत गेलेय. एक माझा हात धरून तिच्याकडे ओढायची, दुसरी माझी पाय धरून तिच्याकडे ओढायची.

काही दिवस बेचव जेवण जेवल्यावर माझं वजन कमी झालं, कारण मला घराबाहेर पडायची सोय नव्हती. मग मी माझ्या सासूबाईंना अगदी प्रेमानं म्हटलं, ‘‘सासूबाई, आता मी आलेय ना, आता या वयात तुम्ही स्वयंपाक कशाला करता? मी करत जाईन दोन्ही वेळचा स्वयंपाक.’’हे ऐकताच त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला, ‘‘या वयात म्हणजे काय? माझं काय वय झालंय का? तुझ्यापेक्षा जास्त काम करू शकते मी. अन् हे माझं घर आहे.मला हवे तेवढे दिवस मी काम करेन.’’

त्यांना कसं समजावून सांगू की सगळ्या भाज्या मला विनवताहेत, बाई गं, तुझ्या सासूच्या तावडीतून आम्हाला सोडव. खरंतर घरातील सर्वांवरच अत्याचार सुरू होता, पण उगीच बोलून वाईटपणा कोण कशाला घेईल?

खरं तर तो बेचव स्वयंपाक बघूनच माझी भूक मरायची. तो स्वयंपाक पाण्याच्या घोटाबरोबर घशाखाली ढकलताना जीभ सहकार्य नाकारायची. नातं सासूसुनेचं. कसं सांगायचं त्यांना? पुन्हा मी नवी एकुलती एक सून…रोजच मला त्या विचारायच्या, ‘‘स्वयंपाक चांगला झालाय ना?’’ मी त्यांच्या नजरेला नजर न देता इकडेतिकडे बघत म्हणायची, ‘‘बरा झालाय की!’’

एवढ्यावर सगळं थांबलं असतं तर प्रश्नच नव्हता. नेमकं अशावेळी दुसऱ्या सासूबाई प्रगट व्हायच्या, ‘‘कालच्या भाज्यांचा रंग तर बघवत नव्हता बाई! भाजी उपवर कन्या म्हणून उभी असती तर लग्न झालंच नसतं. कुष्णी कुष्णी पसंत केली नसती. इतकी वर्ष लग्नाला झालीत, पण एक दिवस धड जेवायला मिळालं नाहीए.’’ (आता या मोठ्या होत्या तर त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा घ्यायला काय हरकत होती?)

त्यांनी एवढं म्हणताच धाकट्या सासूबाईंना एकदम जोर चढला. त्या माझ्याच साक्ष काढतात, ‘‘काय गं प्रिया, काय वाईट होता स्वंयपाक? यांना तर माझ्या प्रत्येक कामात दोष काढायला फारच आवडतं, लग्न होऊन आल्यापासून यांनी कधी प्रेमाचा शब्द उच्चारला नाहीए. कधी जिवाला विसावा नाही मिळाला.’’

दोघी सासवा माझ्या  खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकींवर फैरी झाडतात. मधल्यामध्ये माझी कुंचबणा होते. मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायचं होतं. मी सतत विचार करत होते. शेवटी एक आशेचा किरण दिसला. दुसऱ्याच दिवशी मी जाहीर केलं की आजपासून मी एक स्पेशल डाएट प्लॅन माझ्यापुरता तयार केलाय अन् तो मी अंमलातही आणणार आहे. मी काय खायचं, केव्हा खायचं, कसं खायचं हे सगळं मीच ठरवणार आहे तर रोजच्या स्वयंपाकात मला धरू नका. ही योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली. एकतर त्या बेचव स्वयंपाकातून सुटका झाली, दुसरं म्हणजे दोघी सासूबाईंच्या ओढाताणीतून मला मोकळीक मिळाली. पण पंधरा वीस दिवसातच मी त्या डाएट प्लॅनला कंटाळले. आता पुन्हा घरच्या त्या बेचव स्वयंपाकाला शरण जाण्याखेरीज पर्याय नव्हता. पुन्हा तेच, ये रे माझ्या मागल्या…

मी डाएट प्लॅन बंद केल्यावर तर सासूबाईंचा उत्साह अजूनच ओसंडू लागला. त्या काहीतरी शिजवून आणायच्या अन् ‘‘प्रिया बघ बरं, सांग चव कशी आहे?’’ असं म्हणून मला खायला द्यायच्या. मी एखादा कोपरा मला कुशीत घेईल का म्हणून बघायची. म्हणजे त्यांच्या नजरेला पडायला नको किंवा वाऱ्याचा जोराचा झोत तरी यावा अन् त्यानं मला दुर कुठं तरी उडवून न्यावं असं वाटायचं. पण त्यातलं काहीच प्रत्यक्षात येत नसे. एकदा एक मैत्रीण घरी आली होती. तिनं अमेरिकेतून चुइंगम आणलं होतं. एक मी

सहज म्हणून तोंडात टाकलं. नेमक्या त्याचवेळी सासूबाई कशाची तरी चव दाखवायला म्हणून आल्या. मी म्हटलं, ‘‘माझ्या तोंडात चुइंगम आहे.’’

त्या बिचाऱ्या हिरमुसल्या होऊन परत किचनमध्ये निघून गेल्या. मला एकदम कल्पना सुचली, आता त्या मला चव दाखवायला आल्या की मी म्हणायची ‘‘माझ्या तोंडात चुइंगम आहे.’’

काही दिवस असे गेले. पण सासूबाई माझ्यापेक्षा हुशार होत्या. आता त्या स्वयंपाकघरातूनच मला हाक मारायच्या, ‘‘प्रिया, जरा इकडे ये बरं.’’

मी तिथं गेले की पटकन् विचारायच्या, ‘‘तोंडात चुइंगम नाहीए ना?’’ मी कावरीबावरी व्हायची, त्या पटकन् काहीतरी मला खायला द्यायच्या. एकूण ‘चव बघणं’ या कामातून मला सुटका नव्हती.

एकदा सासूबाईंनी कुठं तरी वाचलं की मोहरीचं तेल हार्ट अॅटकपासून वाचवतं. त्यानं आरोग्य चांगलं राहतं. इतर तेलांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल फार अधिक प्रमाणात असतं. झालं! त्या दिवसापासून आमच्याकडे सरसोंचं म्हणजे मोहरीचं तेल स्वंयपाकात वापरलं जाऊ लागलं. इकडे थोरल्या सासूबाईंनी फर्मान काढलं, ‘‘मला मोहरीच्या तेलाची अॅलर्जी आहे. मी त्या तेलातला स्वयंपाक खाणार नाही. पुन्हा  मधल्यामध्ये माझी पंचाइत झाली. भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये समझोता कसा करावा मला सुधरत नव्हतं. मला खूपच टेंशन आलं. त्यावर उपाय सापडत नव्हता.’’

मला वाटलं लवकर या समस्येवर उपाय मिळाला नाही तर माझं बी.पी. तरी वाढेल, माझी शुगर तरी शूट होईल नाही तर मी डिप्रेशनमध्ये तरी जाईन. नवरोजीला काही म्हणण्यात अर्थच नव्हता. माझी समस्या त्यांना समजणारच नव्हती. रात्रभर मी विचार करत होते, तळमळत होते, अन् शेवटी मी एका निर्णयाप्रत पोहोचले होते.

सकाळी न्याहारीच्या वेळी मी माझ्या दोन्ही सासूबाईंना सांगितलं की माझ्या माहेरची एक नातलग स्त्री आहे. काही कारणानं त्यांची आर्थिक परिस्थिती घसरली आहे, त्यांना स्वयंपाकाचं काम मिळालं तर हवंय. आपण त्यांना कामावर ठेवून घेऊ. त्यांना आर्थिक मदत होईल अन् त्या स्वयंपाकघर पूर्णपणे सांभाळतील.

आधी तर दोघींनी एकजुटीनं विरोध केला. ‘‘कशाला उगीच! आहोत की आपण करायला, खर्च वाढेल ना? वगैरे वगैरे…’’ मग मी जरा कठोरपणे अन् अगदी ठामपणे

सांगितलं, ‘‘मग मी त्यांना दर महिन्याला काही पैसे तसेच देईन. त्यांना काम द्यायचं नसेल तर नका देऊ.’’

मग दोघींनी एकदमच सूर बदलला, ‘‘चल, येऊ देत त्यांना, गरजू आहेत, कष्ट करून पैसा मिळवू बघताहेत, आपण मदत नाही करायची तर कुणी करायची? वगैरे वगैरे.’’ मी मनांतल्यामनांत जाम खुश झाले, आता चांगल्या चवीचा स्वयंपाक होणार अन् पोटभर जेवता येणार, कारण मी एका चांगल्या स्वयंपाकिणीशी बोलणी करून ठेवली होती. आता जे काय करायचं ते ती बघून घेईल. दुसऱ्यादिवशी बरोबर अकरा वाजता दरवाज्याची घंटी वाजली. मी दार उघडलं. दारात ‘ती’ होती. माझ्या समस्येचं उत्तर…दोन सासवांच्या जात्यात मी उगीचच भरडून निघत होते. शेवटी उपाय सापडला. तिलाही आधीच घरातली परिस्थिती समजावून सांगितली होती. ती म्हणाली, ‘‘मी बघेन सगळं. घेईन सांभाळून, तुम्ही काळजी करू नका.’’

अन् मी निश्चंत झाले.

एक दिवसाचा बॉयफ्रेंड

कथा * गिरीजा पालकर

‘‘तू एक दिवसासाठी माझा ब्रॉयफ्रेंड होशील का?’’ त्या मुलीचे हे शब्द सतत माझ्या कानात घुमत होते. मी खरं तर गोंधळून, बावचळून तिच्याकडे बघत होतो. दाट काळे केस अन् हसऱ्या चेहऱ्यावरचे दोन चमकदार डोळे बघून माझं हृदय धडधडायला लागलं. कुणा अनोळखी मुलीकडून अशा तऱ्हेची मागणी आल्यावर दुसरं काय होणार?

मी चांगल्या कुटुंबातला चांगला हुशार मुलगा आहे. लग्नाच्या बाबतीतही माझी मतं ठाम होती. आधी एकदा मी प्रेमात पडलो होतो, पण आमचं प्रेमप्रकरण अगदीच अल्पजीवी ठरलं होतं. त्या मुलीनं माझा विश्वासघात केला. मला ती सोडून गेलीच…खरं तर ही जगच सोडून गेली.

खूप प्रयत्न करूनही मी तिला विसरू शकलो नाही. मग ठरवलं की आता ठरवूनच लग्न करूयात. घरचे लोक ठरवतील, त्या मुलीशी लग्न करून मोकळं व्हायचं.

पुढल्या महिन्यांत माझा साखरपुडा आहे. मुलीला बघितलंही नाहीए. घरच्यांना ती खूपच खूप आवडली आहे. सध्या मी सुट्ट्यांमध्ये मामाकडे आलोय. मी परत घरी गेलो की साखरपुड्याची तयारी सुरू होणार.

‘‘सांग ना, तू माझा एक दिवसाचा…’’ तिनं आपला प्रश्न पुन्हा विचारला.

‘‘मी तर तुला…तुम्हाला…ओळखतही नाही…’’ मी अजूनही बाबरलेलाच होतो.

‘‘ओळखत नाही म्हणूनच तर एक दिवसाचा बॉयफ्रेंड म्हणतेय…नेहमीसाठी नाही विचारलं,’’ तिनं तिचे मोठे मोठे डोळे फडफडवत म्हटलं, ‘‘खरं तर दोनचार महिन्यांतच माझं लग्न होणार आहे. माझ्या घरातली माणसं फार जुनाट विचार सरणीची अन् कट्टर आहेत. ब्रॉयफ्रेंड तर दूर, मी कुणा मुलाशी कधी बोलतही नाही. मी ही आता हे सगळं भाग्य म्हणून स्वीकारलंय. घरचे ज्या मुलाशी लग्न ठरवतील, त्याच्याशी मी मुकाट्यानं लग्न करणार आहे. पण माझ्या मैत्रिणी म्हणतात, लग्नाची मजा तर लव्हमॅरेजमध्ये आहे. निदान एक दिवस तरी बॉयफ्रेंडबरोबर हिंडून फिरून बघायचं आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहेत…फक्त मलाच नाहीए.’’

‘‘एक गोष्ट खरी की मी खूपच संवेदनशील, भावनाप्रधान मुलगी आहे. कुणावर प्रेम करेन तर अगदी मनापासून करेन. त्यामुळेच अशा गोष्टींबद्दल मनात थोडी धाकधूक आहे. मला कळतंय की मी आजकालच्या मुलींसारखी स्मार्ट नाही हे तुम्हाला जाणवतंय. पण बिलीव्ह मी. मी आहे ही अशी आहे. मला फक्त कुणी सज्जन मुलगा एका दिवसासाठी बॉयफ्रेंड व्हायला हवाय…प्लीज…तू मला मदत कर ना?’’

तिच्या एवढ्या सरबत्तीनं मी गारद झाल

‘‘ओके. पण जर मी खरोखरंच तुझ्या प्रेमात पडलो तर?’’

‘‘तर काय? ते एक स्वप्न होतं असं समजून विसरून जायचं. एवढं लक्षात ठेवूनच माझ्याबरोबर यायचं. फक्त एकच दिवस…मस्त हिंडू, फिरू, खाऊपिऊ, एकूणांत मजा करू…बोल, काय म्हणतोस? अन् हे बघ, तशीही मी तुझ्याहून पाच वर्षांनी मोठी आहे. मी तुझ्या ड्रायव्हिंग लायसेन्सवर तुझं वय बघितलंय. खरं तर मघाशी तुझ्याकडून ते अवधानानं खाली पडताना मी बघितलं आणि तुला ते परत करावं म्हणूनच मी आले…पण तू एक खूपच सज्जन मुलगा आहेस असं मला मनातून जाणवलं. तू माझा गैरफायदा घेणार नाहीस असं वाटलं, म्हणून मी तुझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला?’’

मला हसू आलं…ही मुलगी माझ्याहून पाच वर्षं लहान असावी अशी दिसतेय अन् म्हणतेय पाच वर्ष मोठी आहे? असेल बुवा? पण मला मजा वाटत होती. तिला ‘नाही’ म्हणवेना. मी म्हणालो, ‘‘असं कर, परवा सकाळी आठ वाजता इथंच मला भेट. त्या दिवशी अख्खा दिवस मी तुझा बॉयफ्रेंड! ओके!’’

‘‘ओके! थँक्यू.’’ ती हसली. निघून गेली.

घरी परतल्यावरही मी सगळा वेळ तिचाच विचार करत होतो.

दोन दिवसांनी मी ठरलेल्या वेळी तिथं पोहोचलो, तेव्हा ती माझी वाट बघत होती.

‘‘हाय डियर…’’ म्हणत ती पुढे आली.

‘‘हाय…’’ मी जरा संकोचलोच.

पण तिनं पुढे होऊन पटकन् माझा हात पकडला अन् म्हणाली, ‘‘चल, आत्तापासून तू माझा बॉयफ्रेंड अन् मी तुझी गर्लफ्रेंड…अजिबात संकोच करू नकोस, लाजू नकोस…मोकळेपणानं वाग रे!’’

‘‘बस्स, आजचा एक दिवस, मग ती कुठं अन् मी कुठं,’’ मी स्वत:चीच समजूत घातली.

मग आम्ही दोन अनोळखी व्यक्तींनी सगळा दिवस खूप जुनी ओळख असल्यासारखा घालवला.

तिचं नाव प्रिया होतं. मी गाडी चालवत होतो अन् ती माझ्या शेजारी बसली होती. तिचे दाट केस तिच्या खांद्यावर विखुरले होते. तिनं लावलेल्या परफ्यूमचा मंद सुंगध येत होता. त्या सुंगधाने मी वेडावलो होतो. मी एक गाणं गुणगुणायला लागलो. ती टक लावून माझ्याकडे बघत होती, म्हणाली, ‘‘छान गातोस की तू?’’

‘‘होय…गातो थोडंफार…त्याचं काय आहे, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते ना, तेव्हा गाणं असं आपोआप ओठांवर येतं.’’

मी डायलॉग मारला अन् ती खळखळून हसली. तिच्या त्या निर्मळ हसण्यानं मला पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं आठवलं. मला काय होतंय ते मलाच कळेना.

तेवढ्यात तिनं आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं अन् गोड आवाजात विचारलं, ‘‘माय प्रिन्स चार्मिंग, आपण कुठं जातोय?’’

‘‘तू म्हणशील तिथं जाऊयात. पण मला इथली एक फार सुंदर जागा माहीत आहे. सर्वांत रोमँटिक जागा…तुलाही आवडेल ती.’’ मीही आता मोकळा झालो होतो.

‘‘शुअर! तुला वाटेल तिथं घेऊन चल. माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे.’’

‘‘एवढा विश्वास का बरं?’’

‘‘कुणा कुणाच्या डोळ्यात लिहिलेलं असतं की हा माणूस शंभर टक्के विश्वास ठेवण्यायोग्य आहे…म्हणून तर मी तुला निवडलं ना बॉयफ्रेंड म्हणून.’’

‘‘ए…, हे बघ, उगीच इमोशनल होऊ नकोस. हो, नंतर त्रास होईल.’’

‘‘कुणाला? मला की तुला?’’

‘‘कदाचित दोघांना…’’

‘‘नाही. मी अत्यंत प्रॅक्टिकल आहे. मी फक्त एकच दिवस तुझ्यासोबत असणार आहे. कारण मला ठाऊक आहे. आपल्या या नात्याला फक्त एकाच दिवसाची परवानगी आहे.’’

‘‘होय, ते खरंच. मी माझ्या घरात त्यांच्या मर्जीविरूद्ध नाही वागू शकत.’’

‘‘अरे बाबा, घरातल्यांच्या मर्जीविरूद्ध वागायला कोण सांगतंय? मी स्वत: माझ्या बांबाच्या वचनाला बांधिल आहे. त्यांच्या मित्राच्या मुलाशी माझं लग्नं व्हायचंय. सहा महिन्यांनी तो इंडियात येणार आहे. लगेच साखरपुडा अन् पाठोपाठ लग्न…लग्नानंतर मी कदाचित पॅरिसला जाणार…कायमचीच!’’ ती सहजपणे बोलली.

‘‘म्हणजे, तू सुद्धा, त्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातल्या सिमरनसारखी एखाद्या अनोळखी व्यक्तिशी लग्न करणार आहेस? ज्याला कधी बघितलंही नाही, अशा माणसासोबत?’’ मी थेट तिच्या डोळ्यांत बघत विचारलं.

ती ही हसत म्हणाली, ‘‘हो, साधारण तसंच! पण डोंट वरी, मी तुला त्या

सिनेमातल्या शाहरूख खानसारखं माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही.’’

‘‘तर मग हे सगळं का? माझ्या भावनांशी का खेळते आहेस?’’

‘‘अरेच्चा? मी कुठं खेळतेय? ती तर आधीच स्पष्ट सांगितलं होतं की आपलं हे नातं फक्त आजच्या, एकाच दिवसापुरतं आहे म्हणून!’’

‘‘होय, तेही खरंच, इट्स ओके. आय एम सॉरी, चला, आपलं ठिकाण आलं.’’

‘‘अय्या, कित्ती छान!!’’ तिच्या तोंडून उत्स्फूर्त दाद आली. चेहऱ्यावर आनंद झळकला.

आम्ही त्या ठिकाणी थोडं फिरलो. मग ती माझ्या जवळ येत म्हणाली, ‘‘आता तू मला मिठीत घे…सिनेमात दाखवतात तसं…’’

ती माझ्याजवळ आली. तिच्या केसांचा माझ्या खांद्यावर स्पर्श होत होता. मला एकदम माझ्या गर्लफ्रेंडची, बिंदुची आठवण आली. एकाएकी मनात ओढ उत्पन्न झाली. तिच जवळ आहे असं वाटलं.

मी एकदम दूर झालो. ‘‘नाही, मला नाही जमणार हे. कुणा परक्या मुलीला का म्हणून मी जवळ येऊ द्यावं?’’

‘‘का रे बाबा? तुला भीती वाटतेय का? मी याचा व्हिडियो बनवून वायरल करेन म्हणून?’’ ती?खट्याळपणे म्हणाली अन् मग खळखळून हसली…तेच निर्मळ हसू…

मी तोंड फुगवून म्हणालो, ‘‘कर ना व्हिडियो…मला काय? तसंही मी मुलगा आहे, माझी अब्रू थोडीच जातेय?’’

‘‘तेच तर मी तुला समजावते आहे. तू मुलगा आहेस. तुला काय फरक पडणार आहे?’’ ती पुन्हा प्रसन्न हसली. मग म्हणाली, ‘‘पण एक गोष्ट खरी, तू ना आजकालच्या मुलांसारखा नाहीएस.’’

‘‘आजकालच्या मुलांसारखा म्हणजे काय? सगळी माणसं एकसारखी नसतात.’’

‘‘तेच तर! म्हणूनच मी तुला निवडलाय ना? कारण तू माझा गैरफायदा घेणार नाहीस हे मला माहीत होतं. दुसरा कुणी असता, तर त्याला तर ही संधी म्हणजे लॉटरी लागली असं वाटलं असतं.’’

‘‘तुला माझ्याबद्दल इतकी खात्री कशी काय? मी कसा आहे, कसा नाही हे तुला कुठं ठाऊकाय?’’

‘‘तुम्हारी आँखों ने सब बता दिया है मेरी जान,’’ ती अगदी सिनेमाच्या स्टाइलनं बोलली. ‘‘सज्जनपणा डोळ्यांमधून कळतो, तुला माहीत नाही?’’

या मुलीचं वागणं, बोलणं, सगळ्यांनीच मी प्रभावित झालो होतो. खरंच खूप वेगळी होती ती, आम्ही गप्पा मारत तळ्याच्या काठावर फिरलो. ती माझ्या अगदी जवळ येऊन म्हणाली, ‘‘तुझ्या गर्लफ्रेंडला हग नाही करणार?’’ तिनं मला मिठी मारली.

मला वाटलं, काळ जणू तिथंच थांबलाय. काही वेळ आम्ही स्तब्ध उभे होतो. माझ्या हृदयाची वाढलेली धडधड तिलाही जाणवली असावी. मी ही तिला आवेगानं मिठी मारली. जणू धरती अन् आकाशच एकत्र आलंय असा भास झाला. काही क्षणांतच ती माझ्यापासून दूर झाली…लांब जाऊन उभी राहिली.

‘‘बस्स! यापुढे जायचं नाही. स्वत:वरचा ताबा सुटायला नको…चल, परत जाऊयात.’’ ती म्हणाली.

मीही मला सावरत काही न बोलता तिच्या मागून चालायला लागलो. माझ्या श्वास अडखळत होता. घशाला कोरड पडली होती. गाडीत बसताच मी पाण्याची अख्खी बाटली पोटात रिचवली.

तिला हसायला आलं, ‘‘महाशय, दारूची बाटली एका झटक्यात रिकामी केल्यासारखे पाणी प्यायलात!’’

तिच्या बोलण्यानं मलाही हसायला आलं.

‘‘खरंय, तू इतकी छान आहेस ना? मला तर वाटतंय मी तुझ्या प्रेमात पडतोय…’’

‘‘भलतंच काय? अरे पाच वर्षांनी मोठी आहे मी तुझ्याहून. प्रेमात वगैरे पडण्याचा तर विचारच करू नकोस.’’

‘‘पण मी काय करू? माझं मन एक म्हणतंय, माझा मेंदू दुसरंच काही म्हणतोय…’’

‘‘चालायचंच. तू फक्त आजचा विचार कर. विशेषत: लंचचा…भूक लागलीय आता.’’

‘‘एक सुंदर जागा ठाऊक आहे मला. बिंदुला घेऊन मी तिथं एकदा गेलो होतो. तिथंच जाऊयात आपण.’’ मी गाडी वृंदावन रेस्टॉरंटच्या वाटेला वळवली.

‘‘तिथल्या जेवणाची चव अगदी घरच्यासारखी असते. मुख्य म्हणजे एकूण मांडणीही अशी छान आहे की आपण रेस्टॉरंटमध्ये आहोत असं वाटतंच नाही. बागेतच वेताच्या टेबलखुर्च्या मांडल्या आहेत. सगळीकडे छान हिरवळ आहे.’’ मी माझं ज्ञान पाजळलं.

ती उत्सकुतेनं ऐकत होती. तिथं पोहोचल्यावर एकदम खूष झाली. ‘‘खरंच, किती छान आहे ही जागा. प्रसन्न वातावरण अन् घरच्या चवीचं जेवण…किती मज्जा ना?’’

मी तिचा चेहरा न्याहाळत होतो. तिचं मन अगदी निर्मळ होतं. वागण्यात सहज सच्चेपणा होता. जेवण झाल्यावर आम्ही अजून थोडे भटकलो. खूप गप्पा मारल्या. आता आम्ही अधिक मोकळे झालो होतो. शाळा कॉलेजच्या गोष्टी, कुटुंबातल्या, घरातल्या लोकांबद्दल बोललो. थोडी फार ‘प्यार मोहब्बत की बातें’ पण बोललो. बघता बघता सायंकाळ झाली अन् तिची जायची वेळही झाली. मला वाटलं माझा प्राण माझा देह सोडून जातोय. मी घाबरा झालो.

‘‘प्रिया, तुझ्याशिवाय मी कसा राहू शकेन गं? प्रिया, तुझा मोबाइल नंबर दे मला.’’ मी व्यथित अत:करणाने बोललो.

‘‘आर यू सीरियस?’’

‘‘येस, आय एम सीरियस,’’ मी तिचा हात धरला. ‘‘मी तुला विसरू शकत नाही प्रिया. मला वाटतंय मी तुझ्या प्रेमात पडलोय.’’

‘‘आपलं डील विसरू नकोस मयंक.’’ तिनं आठवण करून दिली.

‘‘अगं पण, मित्र म्हणून मैत्री ठेवायला काय हरकत आहे?’’

‘‘नाही, नकोच. मला स्वत:वर ताबा ठेवता आला नाही तर? नकोच, रिस्क नको.’’

‘‘तर मग मी तुझ्याशी लग्न करतो,’’ मी घाईनं म्हणालो. तिला निरोप द्याच्या कल्पनेनंच माझे डोळे भरून आले होते. या एका दिवसांतच तिनं असा काही जिव्हाळा दिला होता की वाटत होतं जन्मभर हिच्याचबरोबर राहावं.

तिनं थोडं लांब जाऊन हात हलवला. ‘‘गुडबाय मयंक, माझं लग्न बाबांनी ठरवलेल्या मुलाशीच होणार. तुला संधी नाहीए. विसर मला तू…’’

ती निघून गेली अन् मी दगडाच्या मूर्तीसारखा तिथंच उभा होतो. मन भरून आलं होतं. जड पावलांनी गाडीत येऊन बसलो आणि स्टियरिंगवर डोकं टेकवून गदगदून रडू लागलो. बिंदू पुन्हा एकदा मला सोडून गेली होती…जायचंच होतं तर माझ्या आयुष्यात आलीच कशाला?

कसाबसा शांत झालो. घरी पोहोचलो. पण मी अत्यंत बेचैन होतो. कोण होती, कुठून आली, कुठं गेली. एका दिवसात माझ्या आयुष्यात उलथापालथ करून गेली. मी मामाच्या घरून माझ्या घरी परतलो. घरी साखरपुड्याची तयारी सुरू होती. मला घरच्यांनी पसंत केलेल्या मुलीला एकदा भेटायचं होतं. म्हणजे मी तिला भेटावं असं घरच्यांचं म्हणणं होतं. पण मला इच्छाच नव्हती.

‘‘मला लग्न करायचं नाही,’’ मी जाहीर केलं अन् घरात वादळ उठलं.

आईनं वेगळ्यानं मला बाहेर नेऊन विचारलं, ‘‘कुणी दुसरी आवडलीय का?’’

‘‘हो.’’ मी सांगून मोकळा झालो.

‘‘ठिक आहे. तिथं बोलणी करूयात. पत्ता अन् फोननंबर दे.’’

‘‘माझ्याकडे नाहीए…’’

‘‘पत्ता नाही, फोन नंबर नाही…असं कसं प्रेम?’’ आई म्हणाली.

‘‘आई, मला ठाऊक नाही. तिची इच्छा काय होती. पण मला वेड लावलं अन् स्वत:चा काहीच ठावठिकाणा न सांगता निघून गेली.’’

मग मी आईला सगळी कथा सांगितली. आईही काही बोलली नाही. अजून काही दिवसांनी घरच्यांच्या हट्टामुळे मला मुलीला भेटायला जावंच लागलं, सगळी वडीलधारी बैठकीच्या खोलीत होती. मुलगी दुसऱ्या खोलीत…मी तिथं गेलो. मुलगी दाराकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून बसली होती. मला काहीच सुचत नव्हतं.

मुलीकडे न बघताच मी बोलायला सुरूवात केली, ‘‘हे बघा, मला तुमची फसवणूक करायची नाहीए. खरं तर मी दुसऱ्याच एका मुलीच्या प्रेमात पडलोय.

तिच्याखेरीज इतर कुणाशी लग्नाची कल्पनाही मी करू शकत नाही. मी तुमची क्षमा मागतो…पण तुम्ही मला नकार द्या…प्लीज…’’

‘‘खरंच नकार देऊ?’’ मुलीनं विचारलं. मी दचकलो…हा तर प्रियाचा आवाज. मी वळून बघितलं. प्रियानंदेखील तोंड वळवळं. खरोखर, ती प्रिया होती.

‘‘तू?’’ आश्चर्यानं मी किंचाळलोच.

‘‘शंका आहे का?’’ तेच निर्मळ हसू.

‘‘पण मग…ते सगळं…?’’

‘‘खरं तर मला ठरवून केलेले लग्न नको होतं. मला प्रेमविवाह करायचा होता. म्हणून आधी तुझ्याकडून तुझं माझ्यावरचं प्रेम वदवून घेतलं. मग या लग्नाला होकार दिला. कसं होतं सरप्राईझ?’’

‘‘फारच छान.’’ मी तिला मिठीत घेत कबूली दिली.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें