‘कोण होणार करोडपती’च्या कर्मवीर विशेष भाग

*सोमा घोष

या आठवड्यात कर्मवीर विशेष भागात आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील येणार आहेत. भास्करराव पाटोदा/गंगापूर नेहरी या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या गावाला ‘आदर्श गाव’ पुरस्कार मिळाला आहे. गावाला आत्तापर्यंत विविध २२ पुरस्कारही मिळाले आहेत. दर १५ मिनिटांवर हात धुण्याची सोय, स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स, शेतीसाठी गावात पाणी आणण्याची सोय, एक गाव एक गणपती योजना, अद्ययावत शाळा; असे अनेक उपक्रम भास्कररावांनी आपल्या गावासाठी आणि गावातल्या लोकांसाठी राबवले आहेत.

भास्कररावांनी महासत्ता म्हणजे नेमकं काय आणि ती कशी असावी, याबद्दलही सांगितलं. त्यांना वाचनाची आवड आहे. वेगवेगळे प्रयोग करत राहणं आणि आपल्या गावाचा विकास करणं त्यांना आवडतं. गावात प्रत्येकानी शिक्षित असावं, आपल्या पायांवर उभं असावं असा त्यांचा प्रयत्न असतो. माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून भास्कररावांचा सन्मान झाला आहे. या आदर्श गावाला अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांनी भेट दिली आहे.

कर्मवीर विशेष भागामध्ये जिंकलेली सर्व रक्कम भास्करराव आपल्या गावातल्या रहिवाशांसाठी आणि गावाच्या विकासासाठी वापरणार आहेत.

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी ‘घरबसल्या लखपती’ होण्याची संधी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती – प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि/किंवा हॉट सीटवर येण्याची संधी.

पाहा, ‘कोण होणार करोडपती – कर्मवीर विशेष’ ३१ जुलै, शनिवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

मी अभिनयासाठी फारसा संघर्ष नाही केला – किरण ढाणे

* सोमा घोष

मराठी मालिका ‘लागीर झालं जी’मधून अभिनयाला सुरुवात करणारी मराठी अभिनेत्री किरण ढाणे महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे. तिने या मालिकेत जयश्री (जयडी) ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मालिका हिट झाल्यामुळे किरणला घरोघरी ओळख मिळाली, परंतु तिने ही मालिका मध्येच सोडून ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत अभिनय करण्यासाठी गेली, कारण यामध्ये किरणची सकारात्मक प्रमुख भूमिका होती. तिला सकारात्मक भूमिका साकारायला आवडते. किरणला पहिला ब्रेक ‘पळशीची पी. टी’ या मराठी चित्रपटात वयाच्या विसाव्या वर्षी मिळाला, ज्यामध्ये तिने धावपटू पी. टी. उषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांनी खूपच कौतुक केलं आणि या चित्रपटाला तीन नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. किरणच्या या प्रवासात तिची आई राणी ढाणे, वडील मारुती ढाणे आणि बहीण प्रतीक्षा ढाणे यांची खूप मदत झाली. विनम्र आणि हसतमुख स्वभावाच्या किरणला प्रत्येक नवीन कथा आकर्षित करते. प्रत्येक व्यक्तीरेखेशी ती स्वत:ला जोडते. किरणशी तिच्या प्रवासबद्दल बातचीत झाली. सादर आहेत काही खास अंश :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मी अभिनयबद्दल फारसा विचार केला नव्हता, परंतु लहान वयातच मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. कॉलेजमध्ये शिकत असताना युथ फेस्टिवलसाठी मी नाट्य स्पर्धेत शिक्षकांच्या सांगण्यावरून भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. हे खरंय की मला अभिनयात एक वेगळी व्यक्तीरेखेत जगायला आवडायचं, कारण ते जगून तो भाव दाखवणं एक आव्हान होतं. याव्यतिरिक्त मला वाचायला आवडतं आणि वाचन करताना पूर्ण दृश्य व्हीज्युअलाईज करू लागायची. गोष्टीत मी स्वत:ला पहायला लागायची. त्यानंतर मी अभिनयात जाण्याचं ठरवलं. लहानपणी मी वेगवेगळया क्षेत्रात जाण्याबद्दल विचार करायची. कधी पोलिस, कधी एअर हॉस्टेस, तर कधी आणखीन काही… मग विचार केला या सगळया व्यक्तीरेखा अभिनयात करता येतील आणि अभिनय माझ्यासाठी योग्य आहे.

पहिल्यांदा अभिनयाच्या इच्छेबद्दल पालकांना सांगताना त्यांचे भाव कसे होते?

त्यांनी अगोदर नकार दिला, तसं माझ्या कुटुंबियांनी मला प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय, परंतु फिल्म इंडस्ट्रीबद्दल गैरसमज होते. त्यांना वाटायचं की मुली तिथे सुरक्षित नाहीएत. याशिवाय साताराहून मुंबईला जाऊन राहणं आणि संघर्ष करणं माझ्यासाठी खूप कठीण असेल. मीदेखील अभिनयाची इच्छा थिएटरने पुर्ण करायचं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये थिएटर करत असताना माझ्या पालकांनी मला सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला सांगितलं. मग अभिनय सोडून अभ्यास सुरु केला. यादरम्यान अभिनय शिकविणाऱ्या एका सरांनी माझ्यासाठी एक ‘वन अॅक्ट’ नाटक लिहिलं, परंतु मी अभिनय करण्यास नकार दिला, परंतु त्यांनी विनंती केल्यानंतर मी केलं आणि मला त्यावर्षी युनिव्हर्सिटीचं बेस्ट अॅक्ट्ररेसचा पुरस्कार मिळाला.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

‘वन अॅक्ट’ नाटक करत असताना मला ‘पळशीची पी. टी.’च्या दिग्दर्शकांनी पाहिलं आणि चित्रपटाची ऑफर दिली. यापूर्वीदेखील मला दोन चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, परंतु मी नकार दिला. या चित्रपटाची कथा ऐकून ती करण्याची इच्छा झाली त्यानंतर घरातल्यांची परवानगी घेऊन मी तो चित्रपट केला. त्या चित्रपटाचे लेखक तेजपाल वाघ एक नवीन मराठी मालिका ‘लागिर झालं जी’ लिहित होते. त्यांनी चित्रपटाच्या सेटवरच माझी ऑडिशन घेऊन त्या मालिकेच्या चॅनेलला पाठवलं. यामध्ये मी नकारात्मक प्रमुख भूमिका साकारली होती.

तुला हिंदीमध्ये काही करण्याची इच्छा आहे का?

मी काही दिवसांपूर्वी वेब सिरीजच हिंदीमध्ये पायलट शूट केलं होतं, परंतु पुढे काही रिस्पॉन्स नाही मिळाला. मला हिंदीत अभिनय करण्याची इच्छा आहे. मराठी मालिकेनंतर मला हिंदीत निगेटिव्ह भूमिकेसाठी ऑफर आली होती, परंतु मला ते करायचं नव्हतं. ‘लागिर झालं जी’मध्ये मी नकारात्मक भूमिका जयडी साकारली होती आणि आणि ती मालिका यशस्वी झाल्यामुळे लोकं मला त्याच नावाने अजूनही ओळखतात.

मराठी फिल्म इंडस्ट्रित तुला कधी कास्टिंग काऊचला समोर जावं लागलं का?

मला इंडस्ट्रित काम करण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही कारण मला समोरूनच पाहिली ऑफर मिळाली. त्या सेटवर मला दुसरी मालिका मिळाली, त्यानंतर माझा अभिनय पाहून ‘एक होती राजकन्या’मध्ये काम मिळालं. मी मराठी चित्रपट अगोदर केला होता, परंतु मालिका अगोदर टीव्हीवर आली आणि नंतर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने माझं आयुष्य बदललं, कारण हा चित्रपट फिल्म फेस्टिवलमध्ये गेला. मला २०१८ साली डेब्यू बेस्ट अॅक्ट्ररेस म्हणून ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत मिळाला, ज्यामुळे मला मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळाली आणि काम मिळणं सहजसोपं झालं. अजून मी तीन चित्रपटांचं चित्रीकरण केलंय, परंतु लॉकडाऊनमुळे डबींगचं काम बाकी आहे, जे लॉकडाऊननंतर करायचं आहे. सगळं काम पूर्वीचा अभिनय पाहून मिळालंय. मला मुंबईला जाऊन अभिन्यासाठी काम शोधावं नाही लागलं. साताराला काम मिळाल्यानंतर मुंबईत आली. त्यामुळे मला कास्टिंग काऊच वा नेपोटीजमबद्दल माहिती नाहीए.

सध्या तुझी दिनचर्या कशी असते?

मला वेगवेगळया भूमिका साकारायची इच्छा आहे आणि याची मी वाटदेखील पाहतेय. याशिवाय सध्या आगामी प्रोजेक्टसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. त्याचा सराव करते, ज्यामध्ये आरशात पाहून स्वत:शी बोलणं, भाव वेगळया पद्धतीने प्रकट करणं इत्यादी करते.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमर तुला किती आकर्षित करतं?

मी सुरुवातीला जेव्हा काम करायला आली होती, तेव्हा इंडस्ट्रीचं काम पाहून घाबरल्यामुळे मला ते करावंसं वाटत नव्हतं, कारण इंडस्ट्रीत माझ्या मागून लोकं काहीही बोलायची, जे मला नंतर समजायचं. गैरसमज पसरविणारी लोकं मला आवडत नाहीत. खरं म्हणजे ते माझ्या यशावर जळतात, खरंतर त्यांचं आणि माझं काम पूर्णपणे वेगळं होतं. यासार्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत मी पुढे काम करत गेली, तेव्हा चांगली लोकं मिळाली.

तू किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

मला वेगवेगळे पेहराव घालायला आवडतात, मी ते घालत असते. शॉपिंग खूप आवडते. मी खूप फुडी आहे आणि वेगवेगळया डिश आवडतात. तणावात असते तेव्हा अधिक खाते. आईच्या हातचं चिकन खूप आवडतं. मी गुलाबजाम खूप छान बनवते.

तू पावसाळयात स्वत:चं सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दिवसभराचा मेकअप उतरवणं गरजेचं आहे, कारण यामुळे चेहऱ्यावर रॅशेस येतात. मी पाणी खूप पिते आणि चेहऱ्यावर फक्त नॅचरल प्रॉडक्ट्स लावते. साताऱ्यातदेखील मी नैसर्गिक गोष्टींनी बनलेल्या स्किन केयर प्रॉडक्ट्सने त्वचेची काळजी घ्यायची.

आवडता रंग – सर्व रंग, खास काळा, बॉटल ग्रीन, इंद्र्रधनुष्य रंग.

आवडता पेहराव – भारतीय पेहराव, साडी, सलवार सूट.

पर्यटन स्थळ – परदेशातील मालदीव, भारतात केरळ आणि काश्मीर.

आवडतं पुस्तक – अट्मोस्ट हॅप्पीनेस -अरुंधती रॉय.

वेळ मिळाल्यावर – चित्रपट पाहणं आणि पुस्तकं वाचणं.

परफ्यूम – अर्माफ

स्वप्नातील राजकुमार – शाहरुख खान वा शाहिद कपूरसारखा.

जीवनातील आदर्श – गरजवंत आणि पेट्सची मदत करणं.

सोशल वर्क – आजूबाजूला राहणाऱ्या गरजवंताना मदत, तेदेखील जात, धर्म न जाणून घेता.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेचं शीर्षकगीत देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात!

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीचे लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनीशीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’ १२ जुलैपासून,  सोम.-शनि., रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

होणार मनोरंजनाची बरसात, ‘अजूनही बरसात आहे.’

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. त्यांचे चाहते आणि प्रेक्षक त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले आहेत. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी ती दोघं एकत्र काम करणार आहेत.

सध्याच्या वातावरणात सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी ही खुसखुशीत मालिका  आणली आहे.  प्रेमाला कुठे असते Expiry Date, असं म्हणणार्‍या मुक्ता आणि उमेश यांची ही एक परिपूर्ण प्रेमकहाणी असणार आहे. मीरा आणि आदी ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. मालिकेच्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद केले आहेत तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’! १२ जुलैपासून सोम.-शनि. रात्री ८ वा.
सोनी मराठी वाहिनीवर.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टिमचे कौतुक

* सोमा घोष

‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे. तुम्ही नेमक्यावेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ विजेत्यांचे आज येथे कौतुक केले.

अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.

सनदी लेखापाल परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या अभिजित ताम्हणकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, नॉन फिक्शन हेड अमित फाळके, निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्यजत्राच्या टिमधील वनिता खरात, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्व कळते. आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भिती आहे. दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्व पटते. यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

माझ्यासाठी रोज आनंदी राहणे गरजेचे आहे – रूचा इनामदार

* सोमा घोष

मॉडेलिंग आणि हिंदी चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री रुचा इनामदार हिने मराठी कमर्शियल चित्रपट ‘भिकारी’मधून मराठी चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले, ज्यात तिचा को-स्टार स्वप्नील जोशी होता. याशिवाय तिने पंजाबी आणि कित्येक वेब सिरीजमध्येही काम केले आहे. पंजाबी लघुचित्रपट ‘मोह दिया तंधा’ यासाठी तिला २०१७ मध्ये ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल’मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरास्कारसुद्धा मिळाला. स्वभावाने शांत आणि स्पष्टवक्त्या रुचाला सगळया प्रकारच्या भूमिका करणे आवडते. भाषा कोणतीही असो, पण ती भूमिकेला जास्त महत्व देते. हेच कारण आहे की तिचा मराठी चित्रपट ‘वेडींगचा सिनेमा’ रिलीज झाला आहे, ज्यात तिच्या भूमिकेला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. रुचा प्रत्येक नव्या चित्रपटाला एक आव्हान समजते आणि या प्रक्रियेला एन्जॉय करते. तिच्याशी झालेल्या बातचितातील काही भाग अशाप्रकारे आहे :

चित्रपटात येण्याची प्रेरणा कशी मिळाली? कुटुंबाचे सहकार्य कसे होते?

लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. मी ३ वर्षांची असताना अभिनय करायला सुरूवात केली. स्टेज परफॉर्मन्सची माझ्यात आवड उत्पन्न झाली. मी गाणे, डान्स आणि पेंटिंग सगळे शिकत मोठी झाले आहे. माझा अकॅडमिक परफॉर्मन्ससुद्धा खूप चांगला होता. घरच्यांची इच्छा होती की मी डॉक्टर बनावे आणि मी तसेच केले. पण त्यांना माहीत होते की मी यात खुश नाहीए. मग एक दिवस आईनेच मला आपल्या आवडीला पुढे न्यायचा सल्ला दिला आणि मी अभिनय क्षेत्रात आले.

आईचे सहकार्य होते, म्हणून काम करणे माझ्यासाठी कठीण नव्हते. माझे कुटुंब आणि माझे मित्र हेच माझ्यासाठी सगळे काही आहेत.

पहिला ब्रेक कसा मिळाला?

इंडस्ट्रीत माझी काही ओळख नव्हती, म्हणून आधी मी एका दिग्दर्शकाला असिस्ट करायचे काम सुरु केले. तिथेच अभिनेता आनंद अभ्यंकर यांनी एका मॉडेल कोऑर्डीनेटरचा नंबर दिला आणि फोटो काढून ऑडिशन द्यायला सांगितले. मी तेच केले आणि कित्येक ऑडिशन दिल्यानंतर मला दिग्दर्शक सुजित सरकारसोबत एक जाहिरात करायची संधी मिळाली. यानंतर तर जाहिरातीची रांगच लागली. मी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, जॉन अब्राहम वगैरे कित्येक मोठया अभिनेत्यांसोबत जाहिराती केल्या आहेत. यामुळे माझी ओळख निर्माण झाली आणि मला पहिला हिंदी चित्रपट ‘चिल्ड्रन ऑफ वॉर’ मिळाला, ज्यात मी एका बांगलादेशी मुलीची भूमिका निभावली होती. समीक्षकांनी माझ्या कामाची खूप प्रशंसा केली. यानंतर आणखी एक हिंदी चित्रपट ‘अंडर द सेम’मध्ये काम करायची संधी मिळाली. यात मी एका राजस्थानी मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातसुद्धा गेला होता. यामुळे लोक मला ओळखू लागले आणि गणेश आचार्य यांनी मला मराठी चित्रपट ‘भिकारी’ मध्ये लीड रोल दिला.

संघर्ष किती होता?

संघर्ष फार नव्हता, कारण चित्रपटात काम करणे ही माझी मानसिकता होती. जगण्याची पद्धत माझ्यासाठी वेगळी आहे. रोज काही चांगले व्हावे हे गरजेचे नाही. मी एक जर्नी ठरवली आहे. ज्याद्वारे मी वाढले आहे. सध्या मी कथ्थक शिकत आहे. कॉलेजमध्ये मी एक ग्रेसफुल डान्सर होते. मी मराठी चित्रपट ‘वेडिंगचा सिनेमा’मध्ये गोंधळ स्टाईलमध्ये डान्स केला आहे, जो करणे खूप कठीण होते. मी सेटवर हा डान्स शिकले. आनंदाची गोष्ट ही आहे की प्रेक्षकांना हा डान्स खूप आवडला. माझ्यासाठी संघर्ष काहीच नाहीए, कारण प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी संघर्ष असतोच.

मराठी आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीच्या काम करण्याच्या पद्धतीत काय फरक वाटतो?

दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळया आहेत, कारण दोघांच्या प्रोडक्शन व्हॅल्यूजही वेगळया असतात. भावनात्मक रूपात पाहिले तर दोन्ही सारखेच आहेत. याशिवाय मराठीत कुटूंबासारखे वातावरण असते, ज्यात तुम्ही अगदी आरामात काम करू शकता. मला हिंदीतही काही त्रास झाला नाही, कारण मला सगळे चांगले लोक भेटले, जे माझ्याश चांगले वागले आणि अभिनय करणे खूप सोपे गेले.

एखादा ड्रीम प्रोजेक्ट आहे का?

कलाकाराच्या रूपात मी ज्या भूमिका जगले नाही, त्या करण्याची इच्छा आहे, पण जर चित्रपट निर्माता ऋषिकेश मुखर्जीच्या कथेसारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तर मजा येईल. त्यांच्या कथा आजही प्रत्येक घरात असतात. त्यांच्या चित्रपटातील भूमिका, प्रत्येक व्यक्तिच्या हृदयाशी जोडलेल्या असतात.

जीवनात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींना दूर कशी करतेस?

मी खूप सकारात्मक आहे आणि नकारात्मक गोष्टीही सकारात्मकतेने घेते. कित्येकदा जेव्हा ऑडिशनमध्ये मला नकाराचा सामना करावा लागायचा, तेव्हा अतिशय वाईट वाटायचे, पण नंतर मी विचार करायचे की यातून मला काय शिकायला मिळाले आणि यापेक्षा अजून चांगले करण्यासाठी काय करायला हवे? माझ्यासाठी रोज आनंदी राहणे खूप गरजेचे आहे.

तुम्हाला कधी स्त्री असण्याचे दु:ख झालेले आहे का?

मी मुंबईत वाढले आहे, म्हणून माझ्या घरात स्त्री आणि पुरुष यात काही फरक नाही. मी माझ्या इच्छेनुसार ग्रो झाले. कोणीही मला टोकले नाही. मला प्रवास करणे खूप आवडते आणि मी खूप भटकंती करते.

वेळ मिळाला तर काय करायला आवडते?

अभिनयाव्यतिरिक्त माझे कितीतरी छंद आहेत, म्हणजे लिहिणे, चित्रपट दिग्दर्शित करणे वगैरे जे मी कामाच्या अधेमधे करत असते.

आवडता पोशाख –    साडी

डिझायनर –     विक्रम फडणीस

आवडता रंग – ब्ल्यू, ब्लॅक, व्हाईट

आदर्श    – माझी आजी

जीवनातील सफलता – प्रामाणिकपणा आणि मेहनत

आवडते पुस्तक – लव्ह अँड बेली

आवडते परफ्युम – बर्साची, ह्युगोबॉस

आवडते पर्यटन स्थळ – भारतात वाराणसी, केरळ आणि परदेशात क्रबि.

 ‘कोण होणार करोडपती’

*सोमा घोष

‘कोण होणार करोडपती’ पाहताना घरबसल्या लखपती होण्याची सधी- प्ले अलॉंगवर ‘कोण होणार करोडपती’ खेळा, १२ जुलैपासून…

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम  नक्कीच जिंकली असती.

आता अशीच एक संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या  प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. १२ जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम  सोम.शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

हा कार्यक्रम पाहताना  प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर सोम.-शनि., रात्री ९ वा. ‘कोण होणार करोडपती’

पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू  शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते  म्हणजे तुमचं ज्ञान! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक  या खेळात निवांत सहभागी  होऊन, लखपती होऊ शकतात.

या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्यच आहे की, ‘आता फक्त ज्ञानाची साथ’ आणि आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ  शकता!

पाहा, ‘कोण होणार करोडपती’,

सोम.-शनि., १२ जुलैपासून  रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले

*सोमा घोष

तनुज गर्ग आणि सोनी पिक्चर्ससह लूप लपेटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी काल मुंबई मध्ये फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले आणि हा त्यांच्या कारकीर्दीमधील 200 वा चित्रपट आहे ज्याच्या पब्लिसिटी कँपैनचा शूट त्यांनी केलं. विशेष बाब म्हणजे ह्या चित्रपटाचे ते प्रोडूसरही आहेत आणि आपल्याच चित्रपटाच्या पोस्टर शूटने त्यांनी 2 शतक पूर्ण केले.

फॅशनच्या दुनियेत नामांकित असूनही चित्रपटाचे पोस्टर शूटिंग करणे हा त्याचा दुसरा छंद आहे.

अतुल कसबेकर म्हणतात, “कॅमेरा हे माझं पहिलं प्रेम आहे आणि चित्रपटाच्या निर्माता या नात्याने मला ह्या चित्रपटाच्या पब्लिसिटी कँपैनमध्येदेखील तो विजन शेप देण्याची परवानगी मिळाली. मी 3 दशकांहून अधिक काळ चित्रपटांच्या मोहिमेचे शूटिंग करत आहे आणि हा चित्रपट खरोखरच विशेष आहे.

२०२२ मधील ‘लूप लपेटा’ हा बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. टीझरच्या घोषणेच्या वेळी बरीच चर्चा रंगली होती आणि आता पोस्टर पाहण्याची उत्सुकता आहे ज्याचे रविवारी मुंबई मध्ये एका फिल्म स्टुडिओमध्ये शूट झाले.

सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिसिस एंटरटेनमेंट आणि आयुष माहेश्वरी निर्मित ‘लूप लपेटा’ हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.

शीतल-अभिजीतचं लव्ह साँग ‘लंडनचा राजा…’

*सोमा घोष

अलीकडच्या काळात सिंगल व्हिडीओ साँग्ज रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहेत. नवी कोरी गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर सहजपणे रुळतही आहेत. असंच एक नवं कोरं लव्ह साँग रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालं आहे. प्राजक्ता फिल्म प्रोडक्शनची आणि पिकल म्यूजिक ची निर्मिती असलेलं ‘लंडनचा राजा’ हे प्रेमगीत बऱ्याच कारणांनी आपलं वेगळेपण जपणारं आहे. सध्या लाइमलाईटमध्ये असलेली शीतल अहिरराव आणि अभिजीत श्वेतचंद्र या कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.

रेखा सुरेंद्र जगताप, नितीन माने आणि संजय शिंदे यांची निर्मिती आणि पिकल म्यूजिक प्रस्तुत असलेल्या ‘लंडनचा राजा.. या गाण्याच्या निमित्तानं रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शीतल आणि अभिजीत या गाण्यासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. नैतिक खरस आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत त्यांनीच संगीतबद्धही केलं आहे. नैतिक आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधूर आवाजात हे गीत रेकॅार्ड करण्यात आलं आहे. कैलाश काशिनाथ पवार यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, अलिबागमधील निसर्गरम्य परिसरात हे गाणं शूट करण्यात आलं आहे. या गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे.
एका राजा आणि राणीची गोष्ट यात दडली आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून ती हळूहळू उलगडत जाते आणि या गीतासोबत ऐकणाराही समरसून जातो हा ‘लंडनचा राजा.. या गीताचा प्लस पॅाइंट आहे. केवळ एक गाणं करण्याच्या भावनेतून नव्हे, तर गाण्याच्या माध्यमातूनही मनात उद्भवणाऱ्या काही तरल भावना रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे गाणं बनवण्यात आल्याचं दिग्दर्शक कैलाश काशिनाथ पवार यांचं म्हणणं आहे.

‘व्हीआयपी गाढव’ आणि ‘एचटूओ’ या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या शीतल अहिररावची मराठी प्रेक्षकांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. शीतलनं आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर मराठी सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिजीतनं यापूर्वी ‘व्वा पैलवान’, ‘तालीम’, ‘संजना’ या चित्रपटांद्वारे लक्ष वेधून घेतलं असून, सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आपापल्या परीनं स्वत:ला सिद्ध करणाऱ्या शीतल-अभिजीत यांनी ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ या गाण्यातही कमाल केली आहे. या रोमँटिक गाण्यात दोघांनी आपल्या परीनं एक वेगळाच रंग भरला आहे. त्यामुळं रसिकांनाही हे गाणं पहायला आणि ऐकायला आवडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये ही या गाण्याची आणखी एक जमेची बाजू आहे. या निमित्तानं रसिकांना अलिबागमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी दिली आहे.

हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करते – ऋता दुर्गुळे

* नमिता धुरी

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तरुण प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी आणि छोट्या पडद्यावर आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सांगतेय तिच्या कलाविश्वातील आयुष्याबद्दल.

अभिनयाची सुरुवात कशी झाली?

माझं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालेलं असलं तरीही मी कधी एकांकिका वगैरे केल्या नव्हत्या. कारण मी अकरावी-बारावी सायन्सला होते. त्यानंतर मी मास मिडिया शिकत होते. त्यामुळे आम्हाला इंटर्नशिप्स कराव्या लागतात. मी ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर इंटर्नशिप करत होते. तिथे मला रसिका देवधर भेटल्या. त्या ‘दुर्वा’ मालिकेच्या कास्टिंग डिरेक्टर होत्या. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी ऑडिशन दिली आणि मला ‘दुर्वा’ मालिकेत दुर्वाची मुख्य भूमिका मिळाली. तेव्हापासून माझं या क्षेत्रात पदार्पण झालं.

सुरुवातीला एक प्यादं म्हणून वापरली जाणारी दुर्वा शेवटी स्वत:च राजकारणात उतरते. तुला काय वाटतं महिला जेव्हा राजकारणात उतरतात, तेव्हा खरंच काही बदल घडतो?

खरंतर या विषयावर मला फार काही बोलता येणार नाही. कारण मालिकेतल्या गोष्टी आणि खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी यांमध्ये खूप फरक असतो. पण तरीही मला असं वाटतं की बदल हा कोणीही घडवू शकतो. त्यासाठी तुम्ही महिलाच असलं पाहिजे असं काही नाही. फक्त तुमचे विचार चांगले असायला हवेत आणि तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात राहिलं पाहिजे.

सध्या सुरु असलेल्या फुलपाखरुमालिकेत मानस तुला म्हणजे वैदेहीला त्याच्या कविता ऐकवून प्रपोज करतो. तू स्वत: कॉलेजमध्ये असताना असं काही तुझ्यासोबत घडलं का?

नाही, माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही. पण हेच फुलपाखरु मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेतली प्रेमकथा जरी आजच्या काळातली असली तरीही प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम खूप वेगळं आहे. आजकाल सोशल मिडियावर आपण सगळ्याच गोष्टी खुलेपणाने बोलत असतो. पण तरीही मानस मात्र स्वत:च्या कवितेतून प्रेम व्यक्त करतो. त्यामुळेच ‘फुलपाखरु’ मालिका प्रेक्षकांना जास्त भावते. पण माझ्याबाबत असं कधीच झालं नाही.

कॉलेजचे दिवस हे मजामस्तीचे तर असतातच, पण या काळात मुलांचं करिअरही घडत असतं. अशावेळी पेपर फुटणे, निकाल वेळेत न लागणे अशा गोष्टींमुळे कॉलेज लाइफवर काय परिणाम होतो?

खरंतर आमची पहिली बॅच होती, जेव्हा क्रेडिट सिस्टीम आली. पण त्यावेळेला आम्हाला फार काही अडचणी जाणवल्या नाहीत. पिढीनुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आताचे विद्यापीठाचे घोळ वगैरे या गोष्टी बघितल्या की मला प्रश्न पडतो की आताचे विद्यार्थी कसे एन्जॉय करत असतील? माझ्या कॉलेज लाइफमध्ये तर मी शूटींगच करत असायचे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला कधी वेळच मिळाला नाही.

प्रसारमाध्यमं, सोशल मिडिया यामुळे कलाकारांना प्रसिद्धी तर मिळते. पण याचे काही दुष्परिणामही असतात का?

मला असं वाटतं की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणतीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत असते, तेव्हा ती चांगली असते. एखाद्या गोष्टीचे अधिकार तुमच्याकडे येतात, तेव्हा त्या गोष्टीची जबाबदारीही तुमच्याकडेच येते. तुम्ही जर पब्लिक फिगर असाल तर तुमच्यावर तेवढीच जबाबदारीही असते की समाजात कसं वागावं, सोशल मिडियावर काय पोस्ट करावं, कधीकधी यामुळे प्रायव्हसीला धक्का लागतो. पण तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता हे तुमच्यावर आहे. माझी प्रायव्हसी हरवली आहे असे अजूनतरी मला वाटत नाही.

तु ज्या मालिका पाहात मोठी झालीस त्या मालिका आणि आताच्या मालिका यात काही फरक जाणवतो का?

हो, खरंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा मलाही असंच वाटायचं की मला किचन पॉलिटिक्स नाही बघायचंय. पण आज ‘तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून मालिका सुरू केल्या आहेत. तरुण जे देशाचं भविष्य असतात, त्यांच्यासाठी मालिका सुरु करणं हा एक वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं.

महिला या सुरुवातीपासूनच मालिकांच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. पण या सगळ्याचा महिलांच्या आयुष्यावर काही परिणाम होताना दिसतो का?

मला असं वाटतं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. गृहिणी मालिकांमधल्या नायिकांशी स्वत:ला रिलेट करत असतात. त्या नायिकांचा महिलांवर काही प्रभाव पडतो का माहीत नाही, पण त्या निमित्ताने त्यांना एक कंपनी मिळत असते.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. पण त्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धेविरोधात आजपर्यंत कोणत्याच मालिका सिनेमातून भाष्य केलं गेलेलं नाही. याविषयी तुला काय वाटतं?

मला असं वाटतं की मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोललं गेलं पाहिजे. ती काही वाईट गोष्ट नाही. त्यातून आपण नवा जीव घडवतो. जी गोष्ट आपल्याला निसर्गाने दिली आहे ती वाईट असूच शकत नाही. त्यामुळे पाच दिवस मंदिरात जायचं नाही हे मला तरी पटत नाही. माझे आईवडीलही अशा गोष्टी मानत नाहीत. मालिकेतल्या नायिकांच्या तोंडून जर याविषयी बोललं गेलं तर बरं होईल. शिवाय या गोष्टीचा खूप आनंद होतोय की या विषयावरचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा लवकरच येतोय. बाकी कोणी याविषयी काही बोलत नसेल तर आपण स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे.

तुझ्या करिअरची सुरुवात तर झाली आहे. पण मग पुढे काय?

मला केणत्याही गोष्टीची घाई नाहीए. मला स्वत:ला आणखी ग्रूम करायचंय. मी नाटक आणि सिनेमामध्ये अजून काम केलेलं नाहीए. त्यामुळे त्या माध्यमांतही मला काम करायचंय. मी प्रत्येकवेळी असा प्रयत्न करेन की मी नेहमी वेगळ्या रुपात सगळ्यांसमोर येईन आणि प्रेक्षकांना खूप आवडेन.

गृहशोभिकेच्या वाचकांना काय सांगशील?

वाचकांना मी इतकंच सांगेन की तुम्हाला जे काही करायचंय ते आत्मविश्वासाने करा. टोकणारे खूप असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे करायचंय त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें