सण-उत्सव कुटुंब आणि मित्रांसोबत साजरे करायला आवडतात – रूचिरा जाधव

* सोमा घोष

उच्चशिक्षित कुटुंबातील मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव ही छोटया पडद्यावरील मराठी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मुळे मराठी इंडस्ट्रीजमध्ये चर्चेत आली. यानंतर तिने टीव्हीवरील बरेच कार्यक्रम आणि चित्रपटांतही भूमिका साकारल्या. तिच्या या प्रवासात तिच्या पालकांनी तिला खूपच सहकार्य केले. म्हणूनच ती या क्षेत्रात पुढे जाऊ शकली. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या रुचिराने अथक परिश्रमाने आपल्या अस्तित्वाचा ठसा मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत उमटवला आहे. नुकतेच तिचे एक मराठी चित्रपट आणि हिंदी वेब शोचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. त्याच्या प्रदर्शनासाठी रुचिरा उत्सुक आहे. तिने फोनवरून या क्षेत्रातील आपल्या प्रवासाबाबत सांगितले, जो खूपच मनोरंजक आहे. सादर आहे यातीलच काही खास भाग :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबात माझ्याव्यतिरिक्त इतर कुठलाही सदस्य अभिनय क्षेत्रात नाही. या कुटुंबातील मी पहिली अभिनेत्री आहे. महाविद्यालयात असताना नाटकात काम करायला मला आवडायचे. याव्यतिरिक्त महाविद्यालयात असताना मी एका नाटकाची संहिताही लिहिली होती आणि अभिनयही केला होता. त्या नाटकासाठी मला राज्यस्तरावर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार आणि त्या नाटकाच्या लेखनासाठीही द्वितीय पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘इंडियन नॅशनल थिएटर’ स्पर्धेतही सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अशा सर्व गोष्टी एकाच वेळी जुळून आल्यामुळे मी याच क्षेत्रात कारकीर्द घडवायचे ठरविले. त्यानंतर मला नाटक, चित्रपट, टीव्ही आणि वेब सर्वांकडूनच कॉल येऊ लागले आणि अभिनय हाच माझा पेशा झाला.

अभिनय क्षेत्रात काम करणार असल्याचे पहिल्यांदाच घरी सांगितले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

सुरुवातीला खूपच अवघड होते, कारण पूर्वी जेव्हा मी नाटकात काम करायचे तेव्हा मला महाविद्यालयातून घरी यायला उशीर व्हायचा. त्यामुळे घरून ओरड खावी लागायची. माझ्या पालकांना इंडस्ट्री आणि त्याच्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीची माहिती नव्हती. जेव्हा मला पुरस्कार मिळू लागले आणि माझे नाव वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा त्यांना वाटले की, मी काहीतरी चांगले काम करीत आहे. त्यामुळे ते मला सर्वतोपरी सहकार्य करू लागले. हे खरे आहे की, इंडस्ट्रीत कधीच कायमस्वरूपी काम मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो आणि मी अजूनही तो करीत आहे. पण मला स्वत:वर विश्वास आहे. महिनाभर जरी काम मिळाले नाही तरी तणाव वाढतो.

गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत काम करणे किती अवघड असते?

सुरुवातीला संघर्षाकडे मी तणाव म्हणून पाहायचे. आता मात्र हसून त्याला सामोरी जाते. सध्याच्या कोरोना काळात घरातून ऑडिशन द्यावे लागते, पण माझे घर लहान आहे. माझ्यामुळे घरातल्यांना मी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. माझ्याकडे स्वत:ची कार नाही. त्यामुळे शूटिंग म्हणजे चित्रिकरणासाठी मला ठाणे येथून खासगी टॅक्सी करून जावे लागते. चित्रिकरण १२ ते १३ तास चालते. मात्र मुंबईत वाहतूक कोंडीमुळे आणखी काही तास वाया जातात. त्यामुळे झोपण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच प्रसन्न चेहऱ्याने चित्रिकरण करणे हे मोठे आव्हान असते. मी जास्त करून कॅबने प्रवास करते. बाहेरून सर्वांना वाटते की, इंडस्ट्रीत केवळ ग्लॅमर आहे, पण त्याआड जी प्रचंड मेहनत करावी लागते ती कोणालाही दिसत नाही. मी काम मनापासून एन्जॉय करीत असल्यामुळे कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाणीव मला होत नाही. अनेकदा जेव्हा एक किंवा दोन महिने झाले तरी काम मिळत नाही तेव्हा मात्र मी खूपच तणावाखाली येते. म्हणूनच काम कितीही दूर आणि प्रचंड मेहनतीचे असले तरी मी नकार देत नाही.

या इंडस्ट्रीजशी संबंधित नसल्यामुळे चांगले काम मिळविण्यासाठी तुला अडचणी आल्या का?

या ६ वर्षांत बराच संघर्ष केला आहे. इंडस्ट्रीला नवशिके नव्हे तर थेट प्रतिभावान कलाकार हवे असतात. मात्र ही प्रतिभा अभिनयातून आणि त्यातून मिळत जाणाऱ्या अनुभवातून गवसते. अभिनयाव्यतिरिक्त तुमची पोहोच आणि या क्षेत्रातील प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळविणे फारच गरजेचे असते. पण मी अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, कारण यामुळे परफॉर्मन्स खराब होतो.

तुझे राहणीमान, बोलण्याच्या पद्धतीमुळे कधी काही सहन करावे लागले आहे का?

मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. फॅशन डिझायनर बनण्याची माझी इच्छा होती. पण घरातल्यांचा विरोध होता. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. अभ्यासासोबतच मी नाटकात काम करू लागले. माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. ही समज माझ्यात खूप आधीपासूनच आहे. त्यामुळे कधी कोणाकडून त्यासाठी ऐकून घ्यावे लागले नाही. याशिवाय नाहक बडबड करण्यापेक्षा मी नेहमीच शांत राहते. कॅमेरा, दिग्दर्शक आणि संवाद या तीन गोष्टींवर नेहमीच लक्ष केंद्रित करते.

कोणत्या मालिकेमुळे तुझ्या जीवनाला कलाटणी मिळाली?

मी बरेच ऑडिशन दिले. काम मिळत राहिले. पण हो, मिळेल त्या कामाला मी होकार देत नाही. जे काम करायचे मी ठरवले आहे तशी भूमिका असेल तरच ती स्वीकारते. तेच काम करण्याची माझी इच्छा असते. स्क्रिप्ट, दिग्दर्शक आणि बॅनर पाहूनच मी चित्रपटाची निवड करते. मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. यात मी ‘माया’ ही व्यक्तिरेखा साकारली. माझ्या आईचे नावही माया आहे. माझ्यासाठी आईच्या नावासोबत काम करणे ही मोठी गोष्ट होती. या भूमिकेने मला ओळख मिळवून दिली. सर्वांना मी माहीत झाले. अनेकदा मराठी मालिकांमध्ये ग्लॅमर फार कमी असते, पण या मालिकेत माझ्या भूमिकेतील अभिनयातच ग्लॅमर होते. यामुळे मला कामाव्यतिरिक्त खूप काही शिकण्याची संधी मिळाली. मला विविध भाषेत वेगवेगळया धाटणीच्या भूमिका साकारायला आवडतात.

तुझे स्वप्न काय आहे?

बायोपिकवर आधारित भूमिकेपेक्षा महिला केंद्रित विषयांवर काम करण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे आव्हान स्वीकारायला मला निश्चितच आवडेल. ऐतिहासिक पात्रांमध्ये मला द्र्रौपदीची भूमिका साकारायला आवडेल, कारण यात प्रत्येक चरित्राशी द्रोपदीचे कुठल्या ना कुठल्या रूपातील नाते जोडले गेलेले आहे.

तू सण-उत्सव कसे साजरे करतेस?

मला प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो. सण-उत्सवांमुळेच आपण आपले कुटुंब, मित्रांशी जोडलेले राहतो. दिवाळीत कंदिल, रांगोळी, पणत्या, चांगले कपडे घालणे, असे सर्व एकत्रच जुळून येते. याशिवाय आई अनेक पारंपरिक पदार्थ बनवते. ते मला सर्वात जास्त आवडतात. दिवाळीत फटाके फोडणे मला आवडत नाही. यामुळे प्रदूषण होते, शिवाय फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरून लपून राहण्याइतकी जागाही जीवजंतूंसाठी शिल्लक राहिलेली नाही.

आवडता रंग – गुलाबी, निळा, काळा, पांढरा.

आवडता पोशाख – भारतीय.

आवडते पुस्तक – मृत्युंजय.

वेळ मिळाल्यास – मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा करणे.

आवडता परफ्युम – नॅचरल इसेन्स.

आवडता पदार्थ – आईच्या हातचे जेवण.

आवडते पर्यटन स्थळ – देशात काश्मीर, विदेशात मालद्वीप.

जीवनातील आदर्श – ज्या गोष्टीमुळे कोणी दुखावले जाईल ती न करणे किंवा असे काहीच न बोलणे.

आवडते काम – अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात प्रत्यक्ष जाऊन काम करणे. आर्थिक मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – बाहुबलीसारखा असण्याची गरज आहे.

‘कशा असतात बायका’ या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

* सोमा घोष

मुंबई – भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रिची सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट म्हणजे ‘कशा असतात ह्या बायका’. नुकताच हा लघुपट सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या लघुपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: महिलावर्गाची लघुपटास पसंती मिळत आहे.

भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणाऱ्या या लघुपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरेनेसुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण केले आहे. या तिघांच्या अभिनयाची सध्या चर्चा सुरु आहे.

या लघुपटामध्ये एक महत्वाची बाब आहे,  ती अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देते. अप्रत्यक्षपणे, ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. जरी भाऊबीज ह्या थीमवर हा लघुपट असला तरी ही कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे.

http://

पुरुषांचा ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ’कॉटन किंग’ यांनी स्त्रियांच्या सन्मानार्थ या लघुपटाची निर्मिती केली आहे. महिलांचं भावविश्व खूप वेगळं असतं. माया, ममता, त्याग, विश्वास, नि:स्वार्थ प्रेम, समर्पित भावना हे सारे गुण स्त्रियांच्या ठायी दिसतात. आपल्या परिवारावर या गुणांची त्या मनसोक्त उधळण करतात. स्त्रियांच्या या भावविश्वाचे हळूवार पदर सदर लघुपटाद्वारे उलगड्ण्य़ात आले आहे.

‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वर पाहायला मिळेल. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपट दिग्दर्शित केला आहे वैभव पंडित यांनी आणि लिहिला आहे मोनिका धारणकर यांनी.

दिग्दर्शक वैभव पंडित म्हणतात, ”भाऊबीजेच्या निमित्ताने शॉर्ट्फिल्म बनवण्य़ासाठी कॉटनकिंगकडून असा ब्रिफ मिळणे विलक्षण होते. उत्तम चर्चा, विचारमंथन आणि अनेकवेळा लिखाण केल्यानंतर आम्ही कथेची योग्य नस पकडू शकलो. कॉटनकिंगने आम्हाला जी मोकळीक दिली, जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत.’’

”आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणॆ बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे,” असे लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंगचे संचालक कौशिक मराठे यांनी सांगितले.

चला, थोडे आणखी समजून घेऊया ’कशा असतात ह्या बायका’!

लघुपट पाहण्यासाठी लिंक – https://www.youtube.com/watch?v=2zW1z081xgQ&t=199s

विनोदवीरांना मिळाली महानायकाची कौतुकाची थाप

* सोमा घोष

लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं. अगदी बरोबर वाचलंत मंडळी. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं, ‘तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करताहात. ते सतत असंच करत राहा’, असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा, अशी मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २० सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.

आता हसण्याचे वार होणार आठवड्यातून चार, पाहायला विसरू नका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  आजपासून सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

मराठी चित्रपटसृष्टिचं भविष्य उज्ज्वल आहे – वीणा जामकर

– सोमा घोष

मराठी नाटय आणि चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख बनविणारी मराठी अभिनेत्री वीणा जामकरचा जन्म मुंबईजवळच्या पनवेल आणि पालनपोषण रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात झालं. तिचं कौटुंबिक वातावरण कला आणि संस्कृतीचं राहिलंय, या कारणामुळेच तिने शाळा आणि महाविद्यालयातून नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अविष्कार नाटयसंस्थेत प्रवेश घेतला आणि मराठी चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला लागली, तिला नाटकांबरोबरच चित्रपट करण्याचीदेखील संधी मिळाली. हसमुख आणि विनम्र स्वभावाच्या वीणाचा प्रवास आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलणं झालं, सादर आहेत त्याचे काही खास अंश :

अभिनयात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा माझी आई अलका जामकरकडून मिळाली. शाळेत शिक्षक असली तरी तिलादेखील नाटकांची आवड होती. खरं म्हणजे महाराष्ट्रात कलेचं वातावरण आहे, त्यामुळे अनेक कुटुंब कला आणि संस्कृतिशी संबंधित असतात. मला आठवतंय की लहानपणी मी आईला उरणमध्ये छोटयाछोटया नाटकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मला अभिनयाची आवड आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने मला काही संवाद बोलायला सांगितले, जे मी अनाहुतपणे करून दाखवलं. बाबा सरकारी कर्मचारी होते, परंतु त्यांना पेंटिंग, कॅलिग्राफीची आवड होती. त्यांनी ९० च्या दशकात आम्हा दोघींना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, कारण त्याकाळी गावात काम करण्यासाठी माझी आई संकोचायची. माझ्या बाबांचे विचार खूप सुधारक होते. माझा भाऊ केमिकल इंजिनिअर आहे.

तुझ्या प्रवासात कुटुंबाने किती सहकार्य केलं?

मी वयाच्या १५व्या वर्षीच सांगून टाकलं होतं की मला अभिनयाची आवड आहे आणि मी शाळेच्या नाटकात सहभागी व्हायची. त्यावेळी माझा भाऊ मुंबईत शिकत होता आणि मलादेखील तिथे जाऊन शिकायचं होतं. अभिनय करण्यासाठी मुंबईत येऊन सर्वांना भेटता येणार होतं. मराठी साहित्यात पदवी घेतल्यानंतर मी नाटकातदेखील व्यस्त राहिली. मानसिक आधारदेखील खूप मिळाला, ज्यामुळे मला काम करताना मजा आली.

पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?

मुंबईची जुनी आणि प्रचलित नाटयसंस्था अविष्कार संस्थेत मी गेली आणि तिथे दिग्दर्शक राजेंद्र बडे त्यांचा पहिला चित्रपट बनवत होते. त्यावेळी मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांची रुची वाढत चाललेली. त्यादरम्यान मला दिग्दर्शकांनी कास्ट केलं आणि त्यामुळे मला चित्रपटात काम करण्याची पद्धत, कॅमेरा फेस करणं इत्यादी समजलं. थिएटरमध्ये काम करणं आणि चित्रपटात काम करणं खूप वेगळं आहे. दुसरा चित्रपट वळू होता, जो खूप चालला आणि आजदेखील तो चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना कसं वाटलं?

अजिबात आवडलं नव्हतं. नाटकात कोणी ना कोणी मागून बोलत असतं, वेळ ठरलेली असते, त्यामुळे मला अभिनय करताना आनंद मिळतो. एक लिंक बनते. चित्रपटात काम करताना वारंवार कट बोलणं, इमोशनचं मागेपुढे होणं छान नाही वाटतं. त्यामुळे मी बाबांनादेखील सांगून टाकलं की मी फक्त नाटकामध्ये कामे करेन. त्यांनी मला फोर्स न करता माझ्यावर सोडून दिलं. मी २०११ साली मी चित्रपट आणि नाटक दोन्हीमध्ये काम करत होती. त्यामुळे मला एकत्रित पैसे मिळत होते त्यामुळे मला मुंबईत राहण्याची वा खाण्यापिण्याची आबाळ होत नव्हती. माझं पॅशन नाटक होतं, परंतु नंतर मला चित्रपट आवडू लागले.

कोणत्या चित्रपटामुळे घरोघरी ओळख मिळाली?

कामाला सुरुवात ‘वळू’  चित्रपटाने झाली, परंतु २०१०साली मी महेश मांजरेकरचा ‘लालबाग परळ’ चित्रपट २०१० साली केला होता, जो मुंबईच्या मिल कामगारांवर बनविला गेला होता, त्यामध्ये माझी मंजुची भूमिका सर्वांना आवडली होती. त्यानंतर ‘कुटुंब’ चित्रपट आला आणि घरोघरी ओळख मिळाली.

मराठी चित्रपटसृष्टित काम करताना कसं वाटतं?

मराठी चित्रपटसृष्टित साहित्य, कलाकृती, कथा आणि कलाकार खूप छान आहेत, एवढी विविधता कुठे पहायला मिळत नाही. या इंड्रस्ट्रीत काम करून छान वाटतं. याव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टित स्टार सिस्टीम नाही, कारण हा व्यवसाय नाहीए. त्यामुळे बॉलिवूड आणि टॉलीवूड चित्रपटामधून कायम चढाओढ लागते. त्याचं बजेट आणि इन्फ्रास्ट्रॅक्चर पुढे मराठी सिनेमा काहीच नाहीए. कधीकधी ‘सैराट’ सारखे सिनेमा येतात, जे सुपरहिट होतात. मराठी चित्रपटसृष्टित पैसा टाकण्यापूर्वी निर्माता एकवार विचार करतोच. मराठीत खूप एक्सप्रेमेंटल आणि लो बजेटचे सिनेमे बनतात, परंतु आता चांगले चित्रपट येत आहेत, पुढे जाऊन भविष्य उज्ज्वल आहे.

तुला इथे पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष अजूनही आहे. चित्रपट एक व्यवसाय आहे, त्यामध्ये खूप पैसा लागलेला असतो. चित्रपट न चालल्यास तुमचं मानधन कधी नाही वाढत. चांगलं काम करुनदेखील सिनेमा चालला नाही तर मानधन खूप कमी मिळतं आणि निर्मातेदेखील अधिक पैसा गुंतवायला घाबरतात. आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे आजदेखील दुसरा मार्ग स्वीकारावा लागतो. टॉलीवूडमध्ये साधारण कलाकाराला ५० कोटी एका सिनेमासाठी मिळतात. तसंच इथे चांगले नाटय आणि चित्रपटगृह नाहीत. त्यामुळे लोकांना चांगली कलाकृती पाहता येत नाही. टीव्ही कलाकार अधिक प्रसिद्ध होतात, कारण टीव्ही प्रत्येक घरात  असतो. याशिवाय अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावत.

मराठी चित्रपटसृष्टीत नेपोटीज्मचा सामना करावा लागला होता का?

इथे नेपोटीज्म नाहीए, मी गेल्या १५ वर्षापासून या इंडस्ट्रित काम करतेय, इथले मोठे कलाकारदेखील बाहेरून येणाऱ्या कलाकारांचं कौतुक करतात आणि कधीही स्वत:च्या मुलांना इंडस्ट्रित आणण्यासाठी कोणावर जोर देत नाहीत. इथे सगळे एकमेकांच काम पाहतात आणि प्रंशसा करतात. इथे असं कोणतंही असं कुटुंब नाहीए जे परंपरेने इंडस्ट्रित आहे, जे हिंदीत पहायला मिळतं. इथे मोकळं वातावरण आहे. कथा खूप वेगळया पद्धतीने लिहिल्यामुळे सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार काम करण्याची संधी मिळते. इथे खूप हँडसम दिसणारा कलाकार हिरो बनतो आणि साधारण दिसणारादेखील हिरो बनू शकतो. इथे  सिनेमाची कथा स्टार असते. क्रिएटीव्हीटीमध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे पावर सेंट्रलाईज्ड होत नाही.

किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

फॅशन मला फार आवडत नाही, परंतु खूप फुडी आहे आणि प्रत्येक प्रकारचं महाराष्ट्रीयन जेवण बनविते.

हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल का?

मी काही खूप ग्लॅमरस अभिनेत्री नाहीए. आता हिंदीत खूपच प्रयोग केले जात आहेत आणि मला काम करायचं देखील आहे.

आवडता रंग – पिवळा.

आवडता पेहराव – भारतीय, खासकरून साडी.

आवडतं पुस्तक – पाडस, लेखक – राम पटवर्धन.

आवडतं पर्यटन स्थळ – देशात मनाली, परदेशात पॅरिस.

वेळ मिळतो तेव्हा – सोलो ट्रिप आणि खाणं बनविणं.

आयुष्यातील आदर्श – सहानुभूती, प्रेम आणि काळजी.

सामाजिक कार्य – मुलं आणि त्यांची मानसिकता.

स्वप्नातील राजपूत्र – फ्रेंडली.

मी अभिनयासाठी फारसा संघर्ष नाही केला – किरण ढाणे

* सोमा घोष

मराठी मालिका ‘लागीर झालं जी’मधून अभिनयाला सुरुवात करणारी मराठी अभिनेत्री किरण ढाणे महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे. तिने या मालिकेत जयश्री (जयडी) ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मालिका हिट झाल्यामुळे किरणला घरोघरी ओळख मिळाली, परंतु तिने ही मालिका मध्येच सोडून ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत अभिनय करण्यासाठी गेली, कारण यामध्ये किरणची सकारात्मक प्रमुख भूमिका होती. तिला सकारात्मक भूमिका साकारायला आवडते. किरणला पहिला ब्रेक ‘पळशीची पी. टी’ या मराठी चित्रपटात वयाच्या विसाव्या वर्षी मिळाला, ज्यामध्ये तिने धावपटू पी. टी. उषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांनी खूपच कौतुक केलं आणि या चित्रपटाला तीन नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. किरणच्या या प्रवासात तिची आई राणी ढाणे, वडील मारुती ढाणे आणि बहीण प्रतीक्षा ढाणे यांची खूप मदत झाली. विनम्र आणि हसतमुख स्वभावाच्या किरणला प्रत्येक नवीन कथा आकर्षित करते. प्रत्येक व्यक्तीरेखेशी ती स्वत:ला जोडते. किरणशी तिच्या प्रवासबद्दल बातचीत झाली. सादर आहेत काही खास अंश :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मी अभिनयबद्दल फारसा विचार केला नव्हता, परंतु लहान वयातच मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. कॉलेजमध्ये शिकत असताना युथ फेस्टिवलसाठी मी नाट्य स्पर्धेत शिक्षकांच्या सांगण्यावरून भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. हे खरंय की मला अभिनयात एक वेगळी व्यक्तीरेखेत जगायला आवडायचं, कारण ते जगून तो भाव दाखवणं एक आव्हान होतं. याव्यतिरिक्त मला वाचायला आवडतं आणि वाचन करताना पूर्ण दृश्य व्हीज्युअलाईज करू लागायची. गोष्टीत मी स्वत:ला पहायला लागायची. त्यानंतर मी अभिनयात जाण्याचं ठरवलं. लहानपणी मी वेगवेगळया क्षेत्रात जाण्याबद्दल विचार करायची. कधी पोलिस, कधी एअर हॉस्टेस, तर कधी आणखीन काही… मग विचार केला या सगळया व्यक्तीरेखा अभिनयात करता येतील आणि अभिनय माझ्यासाठी योग्य आहे.

पहिल्यांदा अभिनयाच्या इच्छेबद्दल पालकांना सांगताना त्यांचे भाव कसे होते?

त्यांनी अगोदर नकार दिला, तसं माझ्या कुटुंबियांनी मला प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय, परंतु फिल्म इंडस्ट्रीबद्दल गैरसमज होते. त्यांना वाटायचं की मुली तिथे सुरक्षित नाहीएत. याशिवाय साताराहून मुंबईला जाऊन राहणं आणि संघर्ष करणं माझ्यासाठी खूप कठीण असेल. मीदेखील अभिनयाची इच्छा थिएटरने पुर्ण करायचं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये थिएटर करत असताना माझ्या पालकांनी मला सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला सांगितलं. मग अभिनय सोडून अभ्यास सुरु केला. यादरम्यान अभिनय शिकविणाऱ्या एका सरांनी माझ्यासाठी एक ‘वन अॅक्ट’ नाटक लिहिलं, परंतु मी अभिनय करण्यास नकार दिला, परंतु त्यांनी विनंती केल्यानंतर मी केलं आणि मला त्यावर्षी युनिव्हर्सिटीचं बेस्ट अॅक्ट्ररेसचा पुरस्कार मिळाला.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

‘वन अॅक्ट’ नाटक करत असताना मला ‘पळशीची पी. टी.’च्या दिग्दर्शकांनी पाहिलं आणि चित्रपटाची ऑफर दिली. यापूर्वीदेखील मला दोन चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, परंतु मी नकार दिला. या चित्रपटाची कथा ऐकून ती करण्याची इच्छा झाली त्यानंतर घरातल्यांची परवानगी घेऊन मी तो चित्रपट केला. त्या चित्रपटाचे लेखक तेजपाल वाघ एक नवीन मराठी मालिका ‘लागिर झालं जी’ लिहित होते. त्यांनी चित्रपटाच्या सेटवरच माझी ऑडिशन घेऊन त्या मालिकेच्या चॅनेलला पाठवलं. यामध्ये मी नकारात्मक प्रमुख भूमिका साकारली होती.

तुला हिंदीमध्ये काही करण्याची इच्छा आहे का?

मी काही दिवसांपूर्वी वेब सिरीजच हिंदीमध्ये पायलट शूट केलं होतं, परंतु पुढे काही रिस्पॉन्स नाही मिळाला. मला हिंदीत अभिनय करण्याची इच्छा आहे. मराठी मालिकेनंतर मला हिंदीत निगेटिव्ह भूमिकेसाठी ऑफर आली होती, परंतु मला ते करायचं नव्हतं. ‘लागिर झालं जी’मध्ये मी नकारात्मक भूमिका जयडी साकारली होती आणि आणि ती मालिका यशस्वी झाल्यामुळे लोकं मला त्याच नावाने अजूनही ओळखतात.

मराठी फिल्म इंडस्ट्रित तुला कधी कास्टिंग काऊचला समोर जावं लागलं का?

मला इंडस्ट्रित काम करण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही कारण मला समोरूनच पाहिली ऑफर मिळाली. त्या सेटवर मला दुसरी मालिका मिळाली, त्यानंतर माझा अभिनय पाहून ‘एक होती राजकन्या’मध्ये काम मिळालं. मी मराठी चित्रपट अगोदर केला होता, परंतु मालिका अगोदर टीव्हीवर आली आणि नंतर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने माझं आयुष्य बदललं, कारण हा चित्रपट फिल्म फेस्टिवलमध्ये गेला. मला २०१८ साली डेब्यू बेस्ट अॅक्ट्ररेस म्हणून ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत मिळाला, ज्यामुळे मला मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळाली आणि काम मिळणं सहजसोपं झालं. अजून मी तीन चित्रपटांचं चित्रीकरण केलंय, परंतु लॉकडाऊनमुळे डबींगचं काम बाकी आहे, जे लॉकडाऊननंतर करायचं आहे. सगळं काम पूर्वीचा अभिनय पाहून मिळालंय. मला मुंबईला जाऊन अभिन्यासाठी काम शोधावं नाही लागलं. साताराला काम मिळाल्यानंतर मुंबईत आली. त्यामुळे मला कास्टिंग काऊच वा नेपोटीजमबद्दल माहिती नाहीए.

सध्या तुझी दिनचर्या कशी असते?

मला वेगवेगळया भूमिका साकारायची इच्छा आहे आणि याची मी वाटदेखील पाहतेय. याशिवाय सध्या आगामी प्रोजेक्टसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. त्याचा सराव करते, ज्यामध्ये आरशात पाहून स्वत:शी बोलणं, भाव वेगळया पद्धतीने प्रकट करणं इत्यादी करते.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमर तुला किती आकर्षित करतं?

मी सुरुवातीला जेव्हा काम करायला आली होती, तेव्हा इंडस्ट्रीचं काम पाहून घाबरल्यामुळे मला ते करावंसं वाटत नव्हतं, कारण इंडस्ट्रीत माझ्या मागून लोकं काहीही बोलायची, जे मला नंतर समजायचं. गैरसमज पसरविणारी लोकं मला आवडत नाहीत. खरं म्हणजे ते माझ्या यशावर जळतात, खरंतर त्यांचं आणि माझं काम पूर्णपणे वेगळं होतं. यासार्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत मी पुढे काम करत गेली, तेव्हा चांगली लोकं मिळाली.

तू किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

मला वेगवेगळे पेहराव घालायला आवडतात, मी ते घालत असते. शॉपिंग खूप आवडते. मी खूप फुडी आहे आणि वेगवेगळया डिश आवडतात. तणावात असते तेव्हा अधिक खाते. आईच्या हातचं चिकन खूप आवडतं. मी गुलाबजाम खूप छान बनवते.

तू पावसाळयात स्वत:चं सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दिवसभराचा मेकअप उतरवणं गरजेचं आहे, कारण यामुळे चेहऱ्यावर रॅशेस येतात. मी पाणी खूप पिते आणि चेहऱ्यावर फक्त नॅचरल प्रॉडक्ट्स लावते. साताऱ्यातदेखील मी नैसर्गिक गोष्टींनी बनलेल्या स्किन केयर प्रॉडक्ट्सने त्वचेची काळजी घ्यायची.

आवडता रंग – सर्व रंग, खास काळा, बॉटल ग्रीन, इंद्र्रधनुष्य रंग.

आवडता पेहराव – भारतीय पेहराव, साडी, सलवार सूट.

पर्यटन स्थळ – परदेशातील मालदीव, भारतात केरळ आणि काश्मीर.

आवडतं पुस्तक – अट्मोस्ट हॅप्पीनेस -अरुंधती रॉय.

वेळ मिळाल्यावर – चित्रपट पाहणं आणि पुस्तकं वाचणं.

परफ्यूम – अर्माफ

स्वप्नातील राजकुमार – शाहरुख खान वा शाहिद कपूरसारखा.

जीवनातील आदर्श – गरजवंत आणि पेट्सची मदत करणं.

सोशल वर्क – आजूबाजूला राहणाऱ्या गरजवंताना मदत, तेदेखील जात, धर्म न जाणून घेता.

फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले

*सोमा घोष

तनुज गर्ग आणि सोनी पिक्चर्ससह लूप लपेटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी काल मुंबई मध्ये फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले आणि हा त्यांच्या कारकीर्दीमधील 200 वा चित्रपट आहे ज्याच्या पब्लिसिटी कँपैनचा शूट त्यांनी केलं. विशेष बाब म्हणजे ह्या चित्रपटाचे ते प्रोडूसरही आहेत आणि आपल्याच चित्रपटाच्या पोस्टर शूटने त्यांनी 2 शतक पूर्ण केले.

फॅशनच्या दुनियेत नामांकित असूनही चित्रपटाचे पोस्टर शूटिंग करणे हा त्याचा दुसरा छंद आहे.

अतुल कसबेकर म्हणतात, “कॅमेरा हे माझं पहिलं प्रेम आहे आणि चित्रपटाच्या निर्माता या नात्याने मला ह्या चित्रपटाच्या पब्लिसिटी कँपैनमध्येदेखील तो विजन शेप देण्याची परवानगी मिळाली. मी 3 दशकांहून अधिक काळ चित्रपटांच्या मोहिमेचे शूटिंग करत आहे आणि हा चित्रपट खरोखरच विशेष आहे.

२०२२ मधील ‘लूप लपेटा’ हा बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. टीझरच्या घोषणेच्या वेळी बरीच चर्चा रंगली होती आणि आता पोस्टर पाहण्याची उत्सुकता आहे ज्याचे रविवारी मुंबई मध्ये एका फिल्म स्टुडिओमध्ये शूट झाले.

सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिसिस एंटरटेनमेंट आणि आयुष माहेश्वरी निर्मित ‘लूप लपेटा’ हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.

शीतल-अभिजीतचं लव्ह साँग ‘लंडनचा राजा…’

*सोमा घोष

अलीकडच्या काळात सिंगल व्हिडीओ साँग्ज रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहेत. नवी कोरी गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर सहजपणे रुळतही आहेत. असंच एक नवं कोरं लव्ह साँग रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालं आहे. प्राजक्ता फिल्म प्रोडक्शनची आणि पिकल म्यूजिक ची निर्मिती असलेलं ‘लंडनचा राजा’ हे प्रेमगीत बऱ्याच कारणांनी आपलं वेगळेपण जपणारं आहे. सध्या लाइमलाईटमध्ये असलेली शीतल अहिरराव आणि अभिजीत श्वेतचंद्र या कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.

रेखा सुरेंद्र जगताप, नितीन माने आणि संजय शिंदे यांची निर्मिती आणि पिकल म्यूजिक प्रस्तुत असलेल्या ‘लंडनचा राजा.. या गाण्याच्या निमित्तानं रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शीतल आणि अभिजीत या गाण्यासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. नैतिक खरस आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत त्यांनीच संगीतबद्धही केलं आहे. नैतिक आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधूर आवाजात हे गीत रेकॅार्ड करण्यात आलं आहे. कैलाश काशिनाथ पवार यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, अलिबागमधील निसर्गरम्य परिसरात हे गाणं शूट करण्यात आलं आहे. या गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे.
एका राजा आणि राणीची गोष्ट यात दडली आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून ती हळूहळू उलगडत जाते आणि या गीतासोबत ऐकणाराही समरसून जातो हा ‘लंडनचा राजा.. या गीताचा प्लस पॅाइंट आहे. केवळ एक गाणं करण्याच्या भावनेतून नव्हे, तर गाण्याच्या माध्यमातूनही मनात उद्भवणाऱ्या काही तरल भावना रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे गाणं बनवण्यात आल्याचं दिग्दर्शक कैलाश काशिनाथ पवार यांचं म्हणणं आहे.

‘व्हीआयपी गाढव’ आणि ‘एचटूओ’ या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या शीतल अहिररावची मराठी प्रेक्षकांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. शीतलनं आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर मराठी सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिजीतनं यापूर्वी ‘व्वा पैलवान’, ‘तालीम’, ‘संजना’ या चित्रपटांद्वारे लक्ष वेधून घेतलं असून, सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आपापल्या परीनं स्वत:ला सिद्ध करणाऱ्या शीतल-अभिजीत यांनी ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ या गाण्यातही कमाल केली आहे. या रोमँटिक गाण्यात दोघांनी आपल्या परीनं एक वेगळाच रंग भरला आहे. त्यामुळं रसिकांनाही हे गाणं पहायला आणि ऐकायला आवडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये ही या गाण्याची आणखी एक जमेची बाजू आहे. या निमित्तानं रसिकांना अलिबागमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी दिली आहे.

हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करते – ऋता दुर्गुळे

* नमिता धुरी

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तरुण प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी आणि छोट्या पडद्यावर आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सांगतेय तिच्या कलाविश्वातील आयुष्याबद्दल.

अभिनयाची सुरुवात कशी झाली?

माझं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालेलं असलं तरीही मी कधी एकांकिका वगैरे केल्या नव्हत्या. कारण मी अकरावी-बारावी सायन्सला होते. त्यानंतर मी मास मिडिया शिकत होते. त्यामुळे आम्हाला इंटर्नशिप्स कराव्या लागतात. मी ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर इंटर्नशिप करत होते. तिथे मला रसिका देवधर भेटल्या. त्या ‘दुर्वा’ मालिकेच्या कास्टिंग डिरेक्टर होत्या. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी ऑडिशन दिली आणि मला ‘दुर्वा’ मालिकेत दुर्वाची मुख्य भूमिका मिळाली. तेव्हापासून माझं या क्षेत्रात पदार्पण झालं.

सुरुवातीला एक प्यादं म्हणून वापरली जाणारी दुर्वा शेवटी स्वत:च राजकारणात उतरते. तुला काय वाटतं महिला जेव्हा राजकारणात उतरतात, तेव्हा खरंच काही बदल घडतो?

खरंतर या विषयावर मला फार काही बोलता येणार नाही. कारण मालिकेतल्या गोष्टी आणि खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी यांमध्ये खूप फरक असतो. पण तरीही मला असं वाटतं की बदल हा कोणीही घडवू शकतो. त्यासाठी तुम्ही महिलाच असलं पाहिजे असं काही नाही. फक्त तुमचे विचार चांगले असायला हवेत आणि तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात राहिलं पाहिजे.

सध्या सुरु असलेल्या फुलपाखरुमालिकेत मानस तुला म्हणजे वैदेहीला त्याच्या कविता ऐकवून प्रपोज करतो. तू स्वत: कॉलेजमध्ये असताना असं काही तुझ्यासोबत घडलं का?

नाही, माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही. पण हेच फुलपाखरु मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेतली प्रेमकथा जरी आजच्या काळातली असली तरीही प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम खूप वेगळं आहे. आजकाल सोशल मिडियावर आपण सगळ्याच गोष्टी खुलेपणाने बोलत असतो. पण तरीही मानस मात्र स्वत:च्या कवितेतून प्रेम व्यक्त करतो. त्यामुळेच ‘फुलपाखरु’ मालिका प्रेक्षकांना जास्त भावते. पण माझ्याबाबत असं कधीच झालं नाही.

कॉलेजचे दिवस हे मजामस्तीचे तर असतातच, पण या काळात मुलांचं करिअरही घडत असतं. अशावेळी पेपर फुटणे, निकाल वेळेत न लागणे अशा गोष्टींमुळे कॉलेज लाइफवर काय परिणाम होतो?

खरंतर आमची पहिली बॅच होती, जेव्हा क्रेडिट सिस्टीम आली. पण त्यावेळेला आम्हाला फार काही अडचणी जाणवल्या नाहीत. पिढीनुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आताचे विद्यापीठाचे घोळ वगैरे या गोष्टी बघितल्या की मला प्रश्न पडतो की आताचे विद्यार्थी कसे एन्जॉय करत असतील? माझ्या कॉलेज लाइफमध्ये तर मी शूटींगच करत असायचे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला कधी वेळच मिळाला नाही.

प्रसारमाध्यमं, सोशल मिडिया यामुळे कलाकारांना प्रसिद्धी तर मिळते. पण याचे काही दुष्परिणामही असतात का?

मला असं वाटतं की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणतीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत असते, तेव्हा ती चांगली असते. एखाद्या गोष्टीचे अधिकार तुमच्याकडे येतात, तेव्हा त्या गोष्टीची जबाबदारीही तुमच्याकडेच येते. तुम्ही जर पब्लिक फिगर असाल तर तुमच्यावर तेवढीच जबाबदारीही असते की समाजात कसं वागावं, सोशल मिडियावर काय पोस्ट करावं, कधीकधी यामुळे प्रायव्हसीला धक्का लागतो. पण तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता हे तुमच्यावर आहे. माझी प्रायव्हसी हरवली आहे असे अजूनतरी मला वाटत नाही.

तु ज्या मालिका पाहात मोठी झालीस त्या मालिका आणि आताच्या मालिका यात काही फरक जाणवतो का?

हो, खरंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा मलाही असंच वाटायचं की मला किचन पॉलिटिक्स नाही बघायचंय. पण आज ‘तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून मालिका सुरू केल्या आहेत. तरुण जे देशाचं भविष्य असतात, त्यांच्यासाठी मालिका सुरु करणं हा एक वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं.

महिला या सुरुवातीपासूनच मालिकांच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. पण या सगळ्याचा महिलांच्या आयुष्यावर काही परिणाम होताना दिसतो का?

मला असं वाटतं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. गृहिणी मालिकांमधल्या नायिकांशी स्वत:ला रिलेट करत असतात. त्या नायिकांचा महिलांवर काही प्रभाव पडतो का माहीत नाही, पण त्या निमित्ताने त्यांना एक कंपनी मिळत असते.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. पण त्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धेविरोधात आजपर्यंत कोणत्याच मालिका सिनेमातून भाष्य केलं गेलेलं नाही. याविषयी तुला काय वाटतं?

मला असं वाटतं की मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोललं गेलं पाहिजे. ती काही वाईट गोष्ट नाही. त्यातून आपण नवा जीव घडवतो. जी गोष्ट आपल्याला निसर्गाने दिली आहे ती वाईट असूच शकत नाही. त्यामुळे पाच दिवस मंदिरात जायचं नाही हे मला तरी पटत नाही. माझे आईवडीलही अशा गोष्टी मानत नाहीत. मालिकेतल्या नायिकांच्या तोंडून जर याविषयी बोललं गेलं तर बरं होईल. शिवाय या गोष्टीचा खूप आनंद होतोय की या विषयावरचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा लवकरच येतोय. बाकी कोणी याविषयी काही बोलत नसेल तर आपण स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे.

तुझ्या करिअरची सुरुवात तर झाली आहे. पण मग पुढे काय?

मला केणत्याही गोष्टीची घाई नाहीए. मला स्वत:ला आणखी ग्रूम करायचंय. मी नाटक आणि सिनेमामध्ये अजून काम केलेलं नाहीए. त्यामुळे त्या माध्यमांतही मला काम करायचंय. मी प्रत्येकवेळी असा प्रयत्न करेन की मी नेहमी वेगळ्या रुपात सगळ्यांसमोर येईन आणि प्रेक्षकांना खूप आवडेन.

गृहशोभिकेच्या वाचकांना काय सांगशील?

वाचकांना मी इतकंच सांगेन की तुम्हाला जे काही करायचंय ते आत्मविश्वासाने करा. टोकणारे खूप असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे करायचंय त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करा.

तू सौभाग्यवती हो मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं आगळावेगळा विवाहसोहळा

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ थोड्याच काळात प्रेक्षकांना आवडू लागली आहे. गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचं प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे.  ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, याची  प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत  झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि  एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी  घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच  राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं  लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.

आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे.

सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मत्यू  झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते.

अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना  पाहायला मिळेल.

पाहा, ‘तू सौभाग्यवती हो’, विवाह सप्ताह – १ जूनपासून, सोम.-शनि., संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे!

* सोमा घोष

राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांमध्ये होते आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ यामालिकेच चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले आहेत.

श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते,

हेया मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे. या मालिकेत देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत.मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिकासाकारल्या आहेत.

पाहा, ‘श्रीमंताघरची सून’,
सोम.-शनि., रात्री ८ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें