मला क्षमा कर

कथा * रेणू श्रीवास्तव

न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरताच आकाशने आईवडिलांना मिठी मारली. किती तरी दिवसांनी मुलाला प्रत्यक्ष भेटल्यामुळे राधाचे डोळे भरून आले. तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली. एक अत्यंत देखणी तरुणी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. आकाशने आईबाबांचं सामान गाडीच्या डिक्कीत ठेवलं. त्यांना गाडीत मागच्या सीटवर बसवून स्वत: पुढल्या सीटवर बसला. त्या तरुणीने मागे बघत डोळ्यांनीच राधा व अविनाशला ‘वेलकम स्माइल’ दिलं. राधाला वाटलं स्वर्गातली अप्सराच समोर बसली आहे.

मुलाची निवड उत्तम असल्याचं राधाला जाणवलं. दीड दोन तासांच्या प्रवासानंतर गाडी एका अपार्टमेंटसमोर थांबली. गाडीतून उतरून जुई दोघांच्या पाया पडली. राधाने तिला प्रेमाने जवळ घेतलं. जुई व आकाशने सामान घरात घेतलं. आकाशचं ते छोटंसं घर सुरेख मांडलेलं होतं. राधा व अविनाश फ्रेश होताहेत तोवर जुईने चहा करून आणला.

दुपारचं जेवण करून राधा व अविनाश झोपली अन् त्यांना गाढ झोप लागली.

‘‘आई, ऊठ ना, तुमच्या जागं होण्याची वाट बघून बघून शेवटी जुई निघून गेली.’’ आकाशने तिला बळेच उठवलं.

अजून झोपायची इच्छा होती तरीही राधा उठून बसली. ‘‘काही हरकत नाही. अमेरिकेतही तू आपल्या जातीची अशी सुंदर गुणी मुलगी निवडलीस हेच खूप आहे. आम्हाला जुई पसंत आहे. फक्त आमची तिच्या घरच्या लोकांशी भेट घडवून आण. लग्न इथेच करायचं आहे तर मग उशीर कशाला?’’

राधाच्या बोलण्याने आकाशचा उत्साह वाढला. म्हणाला, ‘‘तिच्या घरी तिची आजी अन् वडील आहेत. तिच्या लहानपणीच तिची आई वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही. जुई तिच्या आजोळीच वाढली. आजीची इच्छा होती मी घरजावई व्हावं पण मी स्पष्ट शब्दांत नाही म्हणून सांगितलं. उद्या आपण त्यांच्या घरी जाऊयात.’’

राधा कौतुकाने त्याचं बोलणं ऐकत होती. पोरगा अमेरिकेत राहूनही साधाच राहिला होता. अजिबात बदलला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशारच होता. शाळेपासून इंजिनीयर होईपर्यंत त्याने नेहमीच टॉप केलं होतं. पुढल्या शिक्षणासाठी अमेरिकेला आला. शिक्षण संपवून छानपैकी नोकरीही मिळवली अन् जुईसारखी छोकरीही. लोकांना आमचं हे सगळं सुख पाहून किती हेवा वाटेल या कल्पनेने राधाला हसू फुटलं.

‘‘आई का हसतेस?’’ आकाशने विचारलं.

‘‘काही नाही रे, सियाटलला पण आपण जायचंय ना? आनंद अन् नीताशीही जुईची भेट व्हायला हवी. लग्नाची सर्व तयारी करूनच आली आहे मी.’’ राधाने म्हटलं.

आकाशाने जुईला रात्रीच फोन करून सांगितलं की आईबाबांना ती आवडली आहे.

दुसऱ्यादिवशी जुई सकाळीच भेटायला आली. येताना तिने राधा व अविनाशसाठी आजीने केलेले काही भारतीय पदार्थ आणले होते.

‘‘मी तुम्हा दोघांना आकाशप्रमाणेच आईबाबा म्हटलं तर चालेला ना?’’ जुईने विचारलं.

‘‘चालेल ना? तू आकाशहून वेगळी नाहीए अन् आता आमचीच होणार आहेस.’’

थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर जुईने विचारलं, ‘‘तुम्ही माझ्या आजीला व वडिलांना भेटायला कधी येताय? त्यांना फार उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची.’’

‘‘बघूयात. जरा विचार करून दिवस ठरवूयात,’’ राधाने म्हटलं.

‘‘नाही हं! असं नाही चालणार. मी उद्याच सकाळी गाडी घेऊन येते. तुम्ही तयार राहा.’’ जुईने प्रॉमिस घेतल्यावरच राधाला खोलीत जाऊ दिलं.

दुसऱ्यादिवशी सकाळपासूनच राधा खूप उत्साही होती. बोलत होती. हसत होती. अविनाशने तिला त्यावरून चिडवूनही घेतलं. तेवढ्यात जुई गाडी घेऊन आली.

राधा अन् अविनाश तयार होऊन खोलीतून बाहेर पडली तेव्हा जुईच्या मनात आलं, आकाश देखणा आहेच, पण त्याचे आईबाबाही या वयात किती छान दिसतात.

त्या तासाभराच्या प्रवासात सुंदर रस्ते, स्वच्छ वातावरण अन् झाडाझुडपांच्या दर्शनाने राधाच्या चित्तवृत्ती अधिकच बहरून आल्या.

गाडी जुईच्या घरासमोर थांबली. एका कुलीन वयस्कर स्त्रीने पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. ती जुईच्या आईची आई होती. ती त्यांना ड्राँइंगरूममध्ये घेऊन गेली. जुईचे वडील येऊन अविनाशच्या जवळ बसले. त्यांनी एकमेकांची ओळख करून देत अभिवादन केलं. मग जुईचे वडील राधाकडे वळले. दोघांची नजरानजर होताच दोघांचेही चेहरे बदलले. नमस्कारासाठी उचललेले हात नकळत खाली वळले. इतर कुणाच्या लक्षात आलं नाही पण अविनाशला ते सगळं जाणवलं, लक्षात आलं. राधा एकदम स्तब्ध झाली. मघाचा आनंद, उत्साह पार ओसरला. मनाची बैचेनी शरीराच्या माध्यमातून, देहबोलीतून डोकावू लागली.

जुईची आजी एकटीच बोलत होती. वातावरणात ताण जाणवत होता. अविनाश तो दूर करण्याचा प्रयत्न करत होता.

जुईने अन् आजीने जेवण्यासाठी विविध चविष्ट पदार्थ केले होते. पण राधाचा मूड जो बिघडला तो काही सुधरेना. आकाश अन् जुईलाही या अचानक परिवर्तनाचं मोठं नवल वाटलं होतं.

शेवटी जुईच्या आजीने विचारलंच, ‘‘राधा, काय झालंय? मी किंवा आशीष म्हणजे जुईचे बाबा तुम्हाला पसंत पडलो नाहीए का? एकाएकी का अशा गप्प झालात? ते जाऊ देत, आमची जुई तर पसंत आहे ना तुम्हाला?’’

हे ऐकताच राधा संकोचली, तरीही कोरडेपणाने म्हणाली, ‘‘नाही, तसं काही नाही. माझं डोकं अचानक दुखायला लागलंय.’’

‘‘तुम्ही काही म्हणा, पण अमेरिकेत जन्माला आलेल्या जुईचं संगोपन तुम्ही फार छान केलंय, तिच्यावर केलेले संस्कार, तिला मिळालेलं उच्च शिक्षण व त्यासोबतचं घरगुती वळण, या सर्वच गोष्टींचं श्रेय तुम्हा दोघांना आहे. जुई आम्हाला खूपच आवडली आहे. आम्हाला भारतातही अशी सर्वगुणसंपन्न मुलगी शोधून मिळाली नसती. राधा, खरंय ना मी म्हणतो ते?’’ अविनाश म्हणाला.

राधाने त्यांचं बोलणं कानाआड केलं. पण अविनाशच्या बोलण्याने सुखावलेले, थोडे रिलॅक्स झालेले जुईचे वडील तत्परतेने म्हणाले, ‘‘तर मग आता पुढला कार्यक्रम कसा काय ठरवायचा आहे? म्हणजे एंगेजमेण्ट…अन् लग्न?’’

अविनाशला बोलण्याची संधी न देता राधानेच उत्तर दिलं, ‘‘आम्ही नंतर कळवतो तुम्हाला…आम्हाला आता निघायला हवं…आकाश चल, टॅक्सी बोलाव. आपण मॅनहॅटनला जाऊन मग घरी जाऊ. निशा तिथे आमची वाट बघत असेल. मामामामी येणार म्हणून खूप तयारी करून ठेवली असेल. जुईला तिथे आपल्याला कशाला पोहोचवायला सांगतोस? जाऊ की आपण.’’

राधाच्या बोलण्याने सगळेच दचकले.

‘‘यात त्रास होण्यासारखं काही नाहीए. उलट तुमच्या सहवासात जुई खूप खूश असते.’’ आशीषने, जुईच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘सर, अविनाश, तुमची परवानगी असेल तर मला दोन मिनिटं राधा मॅडमशी एकांतात बोलायचं. जुई सहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. त्यानंतर स्वत:लाच एका चुकीचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मी दुसरं लग्न केलं नाही. जुईच्या आजीनेही फार आग्रह केला. पण मी एकट्यानेच जुईच्या आईवडिलांची भूमिका पार पाडली. जोपर्यंत राधा मॅडमकडून लग्नाच्या तयारीसाठी पूणपणे ‘हो’ असा सिग्नल मिळत नाही तोवर माझा जीव शांत होणार नाही.’’

अविनाशने मोकळेपणाने हसून सहमती दर्शवली अन् आशीष व राधाला तिथेच सोडून इतर मंडळी बाहेरच्या लॉनवर आली.

आशीष राधाच्या समोर येऊन उभा राहिला. हात जोडून दाटून आलेल्या कंठाने बोलला, ‘‘राधा, तुझा विश्वासघात करणारा, तुला फार फार मनस्ताप देणारा, मी तुझ्यापुढे उभा आहे. काय द्यायची ती दूषणं दे. हवी ती शिक्षा दे. पण माझ्या पोरीचा यात काही दोष नाहीए. तिच्यावर अन्याय करू नकोस. तुला विनंती करतो, तुझ्याकडे भीक मागतो, जुई अन् आकाशला एकमेकांपासून वेगळं करू नकोस. माझी जुई फार हळवी आहे गं, आकाशशी लग्नं झालं नाही तर ती जीव देईल…प्लीज राधा, मला भीक घाल एवढी.’’

आकाशने भरून आलेले डोळे पुसले, घसा खाकरून स्वच्छ केला अन् तो बाहेर लॉनवर आला. ‘‘जुई बाळा, यांना मॅनहॅटनला घेऊन जा. तिथून घरी सोड अन् त्यांची सर्वतोपरी काळजी घे हं!’’ वडिलांचे हे शब्द ऐकताच जुई व आकाशचे चेहरे उजळले.

राधाने गाडी सरळ घरीच घ्यायला लावली. संपूर्ण प्रवासात ती गप्प बसून होती. घरी पोहोचताच कपडेही न बदलता ती बेडवर जाऊन पडली.

अविनाश टीव्ही बघत बसला.

राधाच्या डोळ्यांपुढे ३२ वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमासारखा उभा राहिला.

आशीष व राधाचा साखरपुडा खूप थाटात पार पडला होता. कुठल्या तरी समारंभात आधी त्यांची भेट झाली अन् मग आशीषच्या घरच्यांनी राधाला मागणी घातली. त्यावेळी मोबाइल नव्हते. रात्री सगळे झोपले की राधा हळूच टेलीफोन उचलून स्वत:च्या खोलीत न्यायची अन् मग तासन्तास राधा व आशीषच्या गप्पा चालायच्या. चार महिन्यांनंतरचा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. तेवढ्यात ऑफिसकडूनच त्याला एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवण्यात आलं.

त्यामुळे लग्न लांबवण्यात आलं. राधाला फार वाईट वाटलं. पण आशीषच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी एवढा त्याग करणं तिचं कर्तव्य होतं. तिने आपलं लक्ष एमएससीच्या परीक्षेवर केंद्रित केलं. पण सहा महिन्यांसाठी अमेरिकेला गेलेला आशीष पुन्हा परतून आलाच नाही. तिथे तो एका गुजराती कुटुंबात पेइंगगेस्ट म्हणून राहू लागला. अमेरिकन आयुष्याची अशी मोहिनी पडली की त्याने तिथेच राहाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात सोपा उपाय होता की अमेरिकन नागरिकत्त्व असलेल्या मुलीशी लग्न करायचं अन् तिथेच नोकरी शोधायची. आशीषने कंपनीची नोकरीही सोडली अन् भारतात येण्याचा मार्गही बंद केला. राहात होता त्या घरातल्या मुलीशी त्याने लग्न केलं. पुढे अमेरिकन नागरिकत्त्वही घेतलं. या विश्वासघातामुळे राधा पार मोडून पडली. पण आईवडिलांनी समजावलं, आधार दिला. पुढे अविनाशशी लग्नं झालं. अविनाश खूप प्रेमळ अन् समजूतदार होता. त्याच्या सहवासात राधा दु:ख विसरली. संसारात रमली. दोन मुलं झाली. त्यांना डोळसपणे वाढवलं. मुलंही सद्गुणी होती. हुशार होती. रूपाने देखणी होती. मुलीने बी.टेक. केलं. तिला छानसा जोडीदार भेटला. लग्न करून ती इथे सियाटललाच सुखाचं आयुष्य जगते आहे. जावई मुलगी मल्टीनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी आहेत.

आकाश सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. टेनिस उत्तम खेळतो. टेनिस टूर्नामेंट्समध्येच जुईशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत अन् पुढे प्रेमात झालं. फेसबुकवर जुईची भेट राधाशी आकाशने करून दिली. जुई त्यांना आवडली. त्यांनी लग्नाला होकार दिला. फार खोलात जाऊन चौकशी केली नाही, तिथेच चुकलं. मुलीच्या वडिलांविषयी अधिक माहिती मिळवायला हवी होती. सगळं खरं तर छान छान चाललेलं अन् असा या वळणावर आशीष पुन्हा आयुष्यात आला. कपाटात बंद असलेल्या स्मृती पुन्हा बाहेर आल्या. राधाला काय करावं कळत नव्हतं. मुलाला कसं सांगावं की या पोरीचा बाप धोकेबाज आहे. जुईशी लग्न करू नकोस यासाठी त्याला काय कारण सांगावं? मनावरचा ताण असह्य होऊन राधा हमसूनहमसून रडायला लागली.

अचानक खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. अविनाश जवळ येऊ बसला होता. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, ‘‘राधा, मनातून तू इतकी कच्ची असशील मला कल्पनाच नव्हती. अगं किती क्षुल्लक गोष्टींसाठी स्वत:ला त्रास करून घेते आहेस? काही कानावर होतं…काही अंदाजाने जाणलं…अगं, आशीषने जे तुझ्याबाबतीत केलं, ते खूप लोक करतात. हा देश त्यांच्या स्वप्नातलं ध्येय होतं. जुईकडे बघूनच कळतंय की तिची आई किती सुंदर असेल. व्हिसा, नागरिकत्त्व, राहायला घर, सर्व सुखसोयी, सुंदर बायको त्याला सहज मिळाली तर त्याने केवळ साखरपुडा झालाय म्हणून भारतात येणं म्हणजे वेडेपणाच होता. तुझं अन् त्यांचं तेच विधिलिखित होतं. माझा मात्र फायदा झाला. त्यामुळेच तू माझ्या आयुष्यात आली. अन् तुझी माझी गाठ परमेश्वराने मारली होती तर तू आशीषला मिळणारच नव्हतीस…मला मान्य आहे, मी तुला खूप संपन्न सुखसोयींनी परिपूर्ण आयुष्य नाही देऊ शकलो. पण मनापासून प्रेम केलं तुद्ब्रझ्यावर, हे तर खरं ना? मघापासून आकाश विचारतोय, आईला एकाएकी काय झालंय? मी काय उत्तर देऊ त्याला.’’

अविनाशच्या बोलण्याने राधा थोडी सावरली. डोळे पुसून म्हणाली, ‘‘माझ्या मनात एकच गोष्ट सतत घुमतेय की वडिलांचेच जीन्स जुईत असतील तर? तर ती आमच्या मुलाला आमच्यापासून तोडेल…आशीष किती क्रूरपणे वागला. आईवडिलांनाही भेटायला आला नाही. घरजावई होऊन बसला इथे. त्याच्या मुलीने माझ्या साध्यासरळ पोराला घरजावई व्हायला बाध्य केलं तर? मुलाला बघायला आपण तडफडत राहाणार का?’’

राधाच्या बोलण्यावर अविनाश अगदी खळखळून हसला. तेवढ्यात आकाश आत आला. रडणारी आई, हसणारे बाबा बघून गोंधळला. शेवटी अविनाशने त्याला सर्व सांगितलं. राधाला वाटणारी भीतीही सांगितली.

आकाशही हसायला लागला. आईला मिठी मारून म्हणाला, ‘‘हेच ओळखलंस का गं आपल्या मुलाला? अगं मी कधीच घरजावई होणार नाही अन् मुख्य म्हणजे जुईही मला घरजावई होऊ देणार नाही. उलट आता तुम्ही इथे आमच्याजवळ राहा. मी मोठं नवं घर घेतलंय. उद्या आपण ते बघायला जातोए. इथे राहिलात तर नीताताई अन् भावजींनाही खूप आनंद होईल.’’

राधाची आता काहीच तक्रार नव्हती. महिन्याच्या आतच आकाश व जुईचं थाटात लग्न झालं. नवपरीणित वरवधू हनीमूनसाठी स्वित्झर्लण्डला गेली. लेक अन् जावई नात, नातवासह आपल्या गावी परत गेले.

अविनाशने राधाला म्हटलं, ‘‘आता या भल्यामोठ्या सुंदर, सुखसोयींनी सुसज्ज घरात आपण दोघंच उरलो. तुला आठवतंय, आपलं लग्न झालं तेव्हा घरात ढीगभर पाहुणे होते. एकमेकांची नजरभेटही दुर्मीळ होती आपल्याला. बाहेरगावी जाण्यासाठी माझ्यापाशी रजाही नव्हती. पैसेही नव्हते. पण आता मुलाने संधी दिलीय, तर आपणही आपला हनीमून आटोपून घेऊयात. आपणही अजून म्हातारे नाही आहोत. खरं ना?’’

राधाने हसून मान डोलावली अन् प्रेमाने अविनाशला मिठी मारली.

विस्तवाशी खेळ

कथा * रवी चांदवडकर

रात्रीचे बारा वाजले तरी स्वातीच्या डोळ्यांत झोप नव्हती. शेजारी झोपलेला नवरा मजेत घोरत होता. दिवसभर दमल्यावरही स्वाती मात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत झोपेची आराधना करत होती. पुन:पुन्हा तिच्या डोळ्यांपुढे तो दुपारचा प्रसंग येत होता. ज्याला ती सहज, हलकाफुलका खेळ समजत होती तो साक्षात विस्तवाशी खेळ होता, या जाणिवेने ती हवालदिल झाली होती. पुरुषांशी मोकळेपणाने बोलणं, हलकेफुलके विनोद करणं, फ्लर्टिंग ही तिच्या मते फारसं गंभीरपणे घेण्याची बाब नव्हती.

स्वाती मैत्रिणींना, नातलगांना नेहमी सांगायची, ‘‘मार्केटमध्ये माझी इतकी ओळख आहे की कोणतीही वस्तू मला स्पेशल डिस्काउंटवर मिळते.’’

स्वाती आपल्या माहेरीही वहिनींना, बहिणींना सांगायची, ‘‘आज मी वेस्टर्न ड्रेस घेतला. खूप स्वस्त पडला मला. डिझायनर साडी घेतली दीड हजाराची, साडी मला फक्त नऊशेला मिळाली, हिऱ्याची अंगठी मैत्रिणींकडून ऑर्डर देऊन करवून घेतली. दोन लाखाची अंगठी मला दीड लाखात पडली.’’

माहेरच्या लोकांच्या नजरेत स्वातीविषयी हेवा, अभिमान अन् कुतूहल असायचं. तिची हुशारी, बारगेनिंग पॉवर अन् वाक्पटुता सगळ्यांना ठाऊक होती. कुणाला काही घ्यायचं असलं तर ते स्वातीला फोन करायचे अन् स्वाती त्यांना हवी असलेली वस्तू योग्य त्या किमतीत मिळवून द्यायची.

आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, शिकलेली, चतुर स्वाती लहानपणापासूनच खरेदी करण्यात हुशार होती. तिला खरेदी करायला फार आवडायचं. एखाद्याला वाचन आवडतं, कुणाला इतर काही आवडतं तसं स्वातीला खरेदी करायला आवडायचं. मोठमोठ्या रकमेच्या वस्तूही ती घासाघीस करून कमी किमतीत अन् थोडक्या वेळात खरेदी करायची. सासरी, माहेरी सर्वत्र तिचं कौतुक व्हायचं.

स्वातीचं माहेर तसं मध्यमवर्गीय. त्यातही निम्न मध्यमवर्गीय. पण लग्नं झालं ते मात्र एका व्यावसायिक घराण्यातल्या अत्यंत श्रीमंत कुटुंबातल्या मुलाशी. कोट्यधीशांच्या घरात येऊन इथले रीतिरिवाज तिने शिकून घेतले पण मुळची काटकसरी वृत्ती मात्र सोडली नाही. घरखर्चात काटकसर करून पैसे वाचवणं अन् त्यातून मनसोक्त खरेदी करणं तिला फार आवडायचं. नवरा भरपूर पैसे हातात देत होता. शिवाय त्याच्या पाकिटातून पैसे लांबवणं हाही स्वातीचा लाडका उद्योग होता. शिकलेल्या, संस्कारवान अन् समजूतदार स्वातीला एक गोष्ट चांगलीच लक्षात आली होती…पुरुषांना काय आवडतं, त्यांचा ‘वीक पॉइंट’ काय असतो, त्यांच्याकडून कमी भावात वस्तू कशी खरेदी करायची हे गणित तिला बरोबर जमलं होतं. ज्या दुकानात किंवा शोरूममध्ये पुरुषमालक असेल तिथेच ती खरेदीला जायची. सेल्समन, सेल्सगर्ल्सना ती म्हणायची, ‘‘तुम्ही फक्त सामान दाखवा. मालकांशी बोलून मी किंमत ठरवीन.’’

खरेदी झाल्यावर हिशेब करताना ती शेठच्या डोळ्यांत डोळे घालून लाडिकपणे म्हणायची, ‘‘भाऊ, किंमत बरोबर लावायची हं! आजची नाही, गेली दहा वर्षं तुमची ग्राहक आहे मी. तुमच्या दुकानाची जुनी कस्टमर.’’

‘‘वहिनी, किंमत जास्त लावणार नाही. काळजी करू नका,’’ दुकानमालक म्हणायचा.

‘‘नाही हो, तुम्ही चक्क जास्त पैसे लावलेत. तुमच्या दुकानावर मला नेहमीच स्पेशल डिस्काउंट मिळतो.’’ बोलता बोलता स्वाती सहजच केल्यासारखा त्याच्या हाताला स्पर्श करायची. ‘‘भाऊ, हे बघा, तुम्ही माझ्या धाकट्या दिरासारखे आहात. दीरभावजयीच्या नात्यात असे रुपयेपैशांचे हिशेब कशाला आणता?’’

बहुधा दुकानदार स्वातीच्या गोड गोड गोष्टींना भुलायचा अन् १५ टक्के, २० टक्के डिस्काउंट द्यायचे.

एका ज्वेलरशी तर स्वातीने चक्क भावजी मेहुणीचं नातं जोडलं होतं. दागिने हा बहुतेक बायकांचा वीक पॉइंट असतो. स्वातीचाही होता. स्वाती खूपदा त्या ज्वेलरच्या दुकानांत जायची. काय काय नवी डिझाइन्स आली आहेत हे नुसतं बघायला गेली, तरी काहीतरी त्यातलं आवडायचं. मग ‘जिजू अन् साली’च्या नात्यात चेष्टामस्करी सुरू व्हायची.

‘‘भावोजी, मी तुमची मेहुणी आहे. तुम्हाला हिंदीतली ती म्हण ठाऊक आहे ना, ‘साली आधी घरवाली…’ माझा हक्कच आहे तुमच्यावर, मी एवढीच किंमत देणार.’’

स्वातीच्या स्पर्शाने सुखावलेला ज्वेलर मिळालेली किंमत मुकाट घ्यायचा. त्याच्या मनात मात्र हे स्पर्शसुख अधिक मिळवण्याचं प्लॅनिंग सुरू असायचं. अर्थात्  स्वाती चतुर होती. ती पैसे दिले की ताबडतोब निघायची. हाती लागणं दूरच होतं.

त्या दिवशी तिच्या वहिनीचा फोन आला. स्वातीला भाचीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करायचे होते. स्वाती खरेदी करतेय म्हटल्यावर ती ‘स्वस्त आणि मस्त’ असणार हे वहिनी जाणून होती.

स्वातीने घरून निघण्याआधीच ज्वेलरला फोन करून सांगितलं होतं, ‘‘माझ्या भाचीचं लग्न आहे. मी खरेदीसाठी येतेय. तुम्ही चांगली चांगली निवडक डिझाइन्स आधीच बाजूला काढून ठेवा. माझ्याकडे फार वेळ नाहीए.’’

दुकानदार अगदी नाटकीपणाने म्हणाला, ‘‘आपला हुकूम सर आँखों पर, आप आइए तो साली साहिबा. तुमच्यासाठी सगळं तयार ठेवतो.’’

ज्वेलरचं हे दुकान म्हणजे फार मोठी शोरूम नव्हती. पण तो ज्वेलर स्वत: उत्तम कारागीर होता. ऑडर्स घेऊन दागिने तयार करायचा. शहराच्या एका कॉलनीत त्याचं दुकान होतं. काही खास गिऱ्हाइकांसाठी तो ऑर्डर केलेले दागिने तिथे ठेवायचा. तिथूनच खरेदीविक्री चालायची. ऑर्डर केलेला माल घ्यायला, तयार मालातून खरेदी करायला अन् नवी ऑर्डर द्यायला गिऱ्हाइकं येतजात असायची. स्वातीच्या एका मैत्रिणीने या ज्वेलरची अन् स्वातीची ओळख करून दिली होती. पण त्या मैत्रिणीलाही हा ज्वेलर स्वातीला कमी किमतीत दागिने कसे देतो हे कोडंच होतं. मैत्रिणीने त्याच्याकडे कधी न बघितलेली डिझाइन्स स्वातीने त्याच्याकडून डिस्काउंटवर मिळवली होती.

‘‘भावोजी, काही वेगळी डिझाइन्स दाखवा ना? ही तर सगळी गेल्या वेळी दाखवलेलीच आहेत.’’ ज्वेलरच्या डोळ्यांत थेट बघत स्वातीने म्हटलं.

ज्वेलरच्या डोळ्यांत काही तरी वेगळी चमक होती. तो तसा नॉर्मल दिसण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वातीने ज्वेलरच्या हातावर हळूच हात ठेवला. मग त्याच्या दंडाला हळूच स्पर्श केला. त्या स्पर्शाने ज्वेलर बेचैन झाला. तोही अधूनमधून स्वातीच्या बोटांना, मनगटाला, हाताला स्पर्श करू लागला. स्वातीला ते खटकलं. तरीही स्पेशल डिस्काउंट घ्यायचा आहे म्हटल्यावर तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

आज दुकानात ग्राहक नव्हतेच अन् एरवी असणारी पाचसात हेल्पर मुलंही दिसत नव्हती. फक्त एकच मुलगा होता. ज्वेलरने त्या मुलाला एक यादी दिली अन् हे सामान बाजारातून आणून टाक म्हणून सांगितलं. ‘‘अन् हे बघ, जाण्याआधी फ्रीजमधून कोल्ड्रिंकच्या दोन बाटल्या काढून उघडून आणून दे, मग जा,’’

दुकानदाराच्या ऑर्डरप्रमाणे मुलगा काम करू लागला.

‘‘नवी डिझाइन्स दाखवा ना?’’ स्वातीने लाडिकपणे म्हटलं.

‘‘दाखवतो ना, कालच आलेली आहेत. केवळ तुमच्यासाठीच वेगळी काढून ठेवली आहेत.’’

‘‘अय्या? खरंच?’’ स्वाती आनंदून बोलली.

‘‘एक ऐकता का? तुम्ही आतल्या केबिनमध्ये या. कारण सगळा माल बाहेर काढून ठेवणं जरा जोखिमीचं असतं अन् आता तर तो पोरगा हेल्परही नाहीए मदतीला.’’

मुलगा कोल्ड्रिंक देऊन निघून गेला होता. आता दुकानात फक्त स्वाती अन् दुकानाचा मालक दोघंच होती. एक क्षणभर स्वातीला भीती स्पर्शून गेली. यापूर्वी इतकी एकटी ती कधीच कोणत्याही दुकानात नव्हती. दुकानदार आपला गैरफायदा घेईल का? तिला तसं काही नको होतं. थोडं लाडिक बोलणं, थोडा हाताबोटांवर स्पर्श एवढ्यावरच तिने डिस्काउंट मिळवले होते. आजही तसंच घडायला हवं होतं. पण तिच्या छातीत धडधडू लागलं. लवकर खरेदी करून बाहेर पडायला हवं. आतला आवाज सांगत होता. धाडस करून ती आतल्या केबिनमध्ये शिरली. आपण अगदी नॉर्मल आहोत हे दाखवण्यासाठी म्हणाली, ‘‘जिजाजी, आज काय झालंय? असे उदास का आहात?’’

‘‘छे:छे: तसं काहीच नाहीए.’’

‘‘काही तरी आहे नक्कीच! मला नाही सांगणार?’’

‘‘तुम्ही नेकलेस बघा…बघता बघता बोलता येईल.’’

स्वाती दिसायला सुंदर होती. खास मेकअप अन् दागिने यामुळे रूप अधिकच खुललं होतं. ज्वेलर एव्हाना चांगलाच विचलित झाला होता. त्याने एकदम धाडस दाखवत स्वातीच्या हाताला स्पर्श केला. स्वाती दचकली, पण, ठीक आहे, नुसत्या स्पर्शाने काय होतंय म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

स्वातीच्या या वागण्याने दुकानदाराचं धाडस वाढलं. तो चेकाळलाच. त्याने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढली.

स्वाती घाबरली, हात सोडवून घेत जरबेने म्हणाली, ‘‘हे काय करताय?’’

ज्वेलरने काही न बोलता पुन्हा तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. आता मात्र स्वाती घाबरली. त्याचं धाडस बघून चकित झाली. आतापर्यंत ती स्वत:च्या फायद्यासाठी पुरुषांना खेळवत होती. पण हा खेळ चांगलाच महागात पडत होता. तिने क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या हातातल्या पर्सचा दमका त्याच्या तोंडावर मारला. दुकानदार हेलपाटला. त्याच्या हातातून स्वातीचा हात सुटला. आता स्वातीने दोन्ही हातांनी त्याला थोबाडायला सुरूवात केली अन् त्याला धक्का दिला. पटकन् आपली पर्स उचलली. धावतच ती केबिनबाहेर अन् मग दुकानाबाहेर आली. आपल्या गाडीत बसली. संताप अन् अपमानाने चेहरा लाल झाला होता. शरीर थरथरत होतं. पटकन् कार स्टार्ट करून तिथून स्वाती निघाली ती सरळ घरीच आली. मनात विचारांचं थैमान होतं. स्वत:चाच राग येत होता. थोडक्यात अनर्थ टळला होता. काहीही वाईट घडू शकलं असतं.

इतकी वर्षं स्वाती ज्याला हलकाफुलका मजेदार खेळ समजत आली होती तो खेळ विस्तवाशीच होता, हे तिला कळलं होतं.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

कथा * पौर्णिमा आरस

डिसेंबर महिन्याची किटी पार्टी रियाच्या घरी होती. हाउसी म्हणजे तंबोलाचा खेळ रंगात आला होता. शेवटचा नंबर अनाउन्स झाला अन् मालिनीची बॉटम लाइन पूर्ण झाली. पंचावन्न वर्षांची मालिनी त्या किटीतली सर्वात वयस्कर सदस्य होती. एरवी मालिनी किती उत्साहात असायची, पण आज बॉटम लाइन पूर्ण होऊनही ती विमनस्क बसून होती. सगळ्यांनी आपापसांत डोळ्यांनीच ‘काय झालंय?’ असं विचारलं अन् कुणालाच काही माहिती नसल्याने नकारार्थी माना हलवत त्यांनी ‘काही ठाऊक नाही,’ असंही सांगितलं.

किटीतली सर्वात लहान सभासद होती रिया. तिनेच शेवटी विचारलं, ‘‘मावशी, आज काय झालंय तुम्हाला? इतके नंबर कापले जाताहेत तरी तुम्ही अबोल, उदास का?’’

‘‘काही नाही गं!’’ उदास होऊन मालिनीने म्हटलं. अंजलीने आग्रहाने म्हटलं, ‘‘मावशी, काही तरी घडलंय नक्की. सांगा ना आम्हाला…’’

अनीता मालिनीची खास मैत्रीण होती. तिने विचारलं, ‘‘पवन बरा आहे ना?’’

‘‘बरा आहे की!’’ मालिनीने उत्तर दिलं, ‘‘चला, हा राउंड पूर्ण करूयात.’’

‘‘बरं तर, हा राउंड होऊन जाऊ दे,’’ इतरांनीही संमती दिली.

हाउसीचा पहिला राउंड संपला तेव्हा रियाने विचारलं, ‘‘न्यू ईयरचा काय कार्यक्रम ठरवलाय तुम्ही?’’

सुमन म्हणाली, ‘‘अजून काहीच ठरलेलं नाहीए. बघूयात, सोसायटीत काही कार्यक्रम असेल तर…’’

नीताचा नवरा विनोद सोसायटीच्या कमेटीचा सभासद होता. तिने म्हटलं, ‘‘विनोद सांगत होते यंदा आपली सोसायटी न्यू ईयरचा कोणताही कार्यक्रम करणार नाहीए. कारण कमिटी मेंबर्समध्ये काही मुद्दयांवर मतभेद आहेत?’’

सारिका वैतागून म्हणाली, ‘‘खरं तर आपल्या सोसायटीत किती छान कार्यक्रम व्हायचा. बाहेर जाण्याची गरजच वाटत नसे. बाहेर एक तर सर्व हॉटेल्समधून गर्दी भयंकर. तासन्तास ताटकळत उभं राहावं लागतं. शिवाय ते जेवण महाग किती पडतं? जा, खा अन् परत या. यात कसली आलीय मजा? सोसायटीचा कार्यक्रम खरंच छान असतो.’’

रियाने पुन्हा विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय बेत आहे? पवनकडे जाणार आहात का?’’

‘‘सांगणं अवघड आहे. अजून तरी काहीच ठरलेलं नाहीए.’’

हाउसीचा एक आणखी राउंड, थोड्या गप्पाटप्पा, खाणंपिणं झालं अन् किटी पार्टी संपली. मंडळी घरोघर निघून गेली.

मालिनीही घरी आली. कपडे बदलून ती पलंगावर आडवी झाली. समोरच शेखरचा, तिच्या नवऱ्याचा फोटो होता. त्याकडे नजर जाताच तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

शेखरला जाऊन आता सात वर्षं झाली होती. मॅसिव्ह हार्टअॅटक आला अन् काहीही करायची उसंत न देता शेखर गेला. एकुलता एक मुलगा पवन अन् ती मुलुंडच्या टू बेडरूम फ्लॅटमध्ये आत्तापर्यंत राहात होती. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. बरे आनंदात दिवस जात होते. पण नीतूला, म्हणजे सुनेला वेगळं घर हवं होतं. पवनचाही तिला पाठिंबा होता. खरं तर मुलगी नसल्याने मालिनीने नीतूला मुलीसारखंच प्रेम दिलं होतं. तिचे सगळे दोष पोटात घातले होते. सर्व लाड पुरवले होते.

पवनचं ऑफिस अंधेरीला होतं. पवनने म्हटलं, ‘‘आई, येण्याजाण्यात वेळही फार जातो शिवाय दमायलाही होतं. मी विचार करतोय अंधेरीतच एक फ्लॅट घ्यावा…’’

‘‘तुला जे योग्य वाटेल ते कर. हे घर भाड्याने द्यावं लागेल ना? इथलं सर्वच सामान शिफ्ट करायचं का?’’ मालिनीने विचारलं.

‘‘भाड्याने? हे घर भाड्याने का द्यायचं? तुला राहायला हे घर लागेलच ना?’’

मालिनीला धक्काच बसला. ‘‘मी इथे? एकटीच? एकटी कशी राहीन मी?’’

‘‘त्यात काय झालं? अगं, तिथे मी वन-बेडरूमचं घर घेणार आहे. तिथे तुला अडचण होईल ना? इथे बरी मोकळीढाकळी राहाशील. तुझ्या भरपूर ओळखी आहेत इथे. नव्या ठिकाणी या वयात अॅडजेस्ट व्हायला त्रासच होतो गं! शिवाय अधूनमधून आम्ही येऊ इथे. तूही येत जा तिथे.’’

यावर सगळे अश्रू डोळ्यांतून मागे परतून लावून मालिनीने परिस्थिती स्वीकारली होती. दुसरा पर्यायही नव्हता. उत्साहाने दोघं नव्या घरात निघून गेली. आर्थिकदृष्ट्या मालिनीला काही प्रॉब्लेम नव्हता. शेखरने छान नियोजन करून ठेवल्यामुळे मालिनीच्या हातात भरपूर पैसा होता. शिवाय ती विचारी, समंजस अन् धीराची होती. गेली वीस वर्षं ती या सोसायटीत राहात होती. सर्वांशी तिचे संबंध सलोख्याचे होते. मदतीला धावून जाण्याचा स्वभाव, सर्वांशी जमवून घ्यायची वृत्ती यामुळे सोसायटीतल्या लहानथोर सर्वांनाच तिच्याबद्दल आपुलकी अन् आदर वाटत असे. एम.ए.बी.एड असल्याने ती लहान मुलांच्या ट्यूशन्स घेत होती. तो एक छान विरंगुळा होता.

नीतूला दिवस गेल्यावर पवन अधूनमधून मालिनीला आपल्या घरी नेत होता. सासू सुनेचे सर्व डोहाळे पुरवत होती. बाळंतपणाच्या महिनाभर आधीच मालिनी पवनच्या घरी जाऊन राहिली. नीतूला मुलगा झाला. नीतूचे आईवडील परदेशातच राहात असल्यामुळे ते इथे येऊन राहाणं शक्यच नव्हतं. लहानग्या यशची तीन महिने छान काळजी घेतली मालिनीने. बाळंतिणीलाही भरपूर विश्रांती, तेलमालिश, सकस, सात्त्विक आहार, सगळंच यथासांग केलं. यश तीन महिन्यांचा झाला अन् पवनने आईला परत तिच्या घरी आणून सोडलं. लहानग्या यशला सोडून येताना मालिनीला रडू अनावर झालं होतं. पण काय करणार?

सणावाराला, काही समारंभ असला म्हणजे पवन त्यांना घ्यायला यायचा. त्याही आनंदाने जायच्या. पण तिथं पोहोचल्याबरोबर घरातली सगळी कामं त्यांच्या अंगावर टाकून दोघं नवराबायको खरेदीसाठी, भटकण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी निघून जायची. यशलाही त्यांच्यावरच सोपवून जायची. जाताना अमूक खायला कर, तमुक खायला कर हेही बजावून जायची. यशला सांभाळून सगळं करताना त्याची धांदल व्हायची. जीव दमून जायचा. काम झालं की लगेच पवन त्यांना घरी सोडून यायचा. इथे घरी त्यांची खूप जुनी मोलकरीण होती. तिचा मालिनीवर जीव होता. ती मनोभावे तिची सेवा करत असे. मालिनीची कुतरओढ तिला समजत होती.

यंदाच्या दिवाळीला पवनने मालिनीला घरी नेलं. ढीगभर फराळाचे जिन्नस तिच्याकडून करवून घेतले. चार दिवस सतत काम केल्याने मालिनीची कंबर दुखायला लागली. ते नीतूच्या लक्षात येताच तिने पवनला म्हटलं, ‘‘आजच आईला घरी सोडून ये. सगळं काम तर झालंच आहे. आता आरामच करायचाय तर त्यांनी त्यांच्या घरी करावा.’’

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पवनने आईला तिच्या घरी नेऊन सोडलं. मालिनीला त्या क्षणी लक्षात आलं, मुलगा किंवा सून तिची नाहीत. यापुढे ती कधीही त्यांच्या घरी जाणार नाही. दिवसभर राबून दमलेल्या जिवाला दोन प्रेमाचे शब्द हवे होते. पण तिथे तर कोरडा व्यवहार होता. समोरच्या फ्लॅटमधल्या सारिकाने त्यांचं घर उघडं बघितलं तर ती चकित झाली.

‘‘मावशी, आज तुम्ही इथे? पवन…पवन अन् नीतूही आली आहेत का?’’

‘‘नाही आली,’’ भरल्या कंठाने मालिनीने म्हटलं. त्यांची विद्ध नजर सगळं सांगून गेली. सारिकाला काही विचारण्याची गरजच भासली नाही. तिनेच पटकन् घराचा केर काढला. पुसून घेतलं. दारापुढे रांगोळी घालून चार पणत्याही लावल्या. एका ताटात फराळाचे पदार्थ रूमालाखाली झाकून आणून टेबलावर ठेवले. रात्री जेवायचं ताटही घेऊन आली अन् बळजबरी मालिनीला चार घास खायला दिले.

त्या दिवसाच्या आठवणीने आत्ताही मालिनीचे डोळे पाणावले. आज रियाकडे जाण्यासाठी मालिनी आवरत असतानाच पवनचा फोन आला, ‘‘आई न्यू ईयरला तुला घ्यायला येतो. माझे बॉस अन् कलिग्ज डिनरसाठी येणार आहेत.’’

एरवी फोन केला तर पवन, ‘मी बिझी आहे, नंतर फोन करतो,’ म्हणून फोन कट करायचा. आजचा फोन दिवाळीनंतर प्रथमच आला होता. नीतूही केव्हातरी अगदी औपचारिक फोन करते.

फोनच्या आवाजाने मालिनी पुन्हा वर्तमानकाळात आली. फोन नीतूचाच होता.

‘‘आई, नमस्कार, कशा आहात?’’

‘‘बरी आहे मी. तुम्ही तिथे कसे आहात?’’

‘‘आम्ही ठीकठाक आहोत आई, पवनने तुम्हाला सांगितलंच असेल. न्यू ईयरची पार्टी आहे. वीस एक लोक असतील. तुम्ही दोन दिवस आधीच या. मला तर स्वयंपाक येत नाही. तुमच्या हातचं जेवण सर्वांना आवडतंही! तर, तुम्ही तयारीत राहा. मी नंतर पुन्हा फोन करते,’’ फोन बंद झाला.

‘किती चतुर अन् लबाड, स्वार्थी अन् कोरडी आहेत ही माणसं’?मालिनीच्या मनात आलं. पोटचा पोरगाच असा आहे तर सुनेला काय दोष द्यायचा? जाऊ दे. आता आपण फक्त आपला विचार करायचा. त्यांच्या हातातली कठपुतली नाही व्हायचं. दिवाळीत काम करून कंबर दुखून आली होती. आठ दिवस लागले बरं व्हायला. आता पुन्हा तिथे जायचं नाही. कशाला त्रास करून घ्यायचा स्वत:ला?

डिसेंबरची किटीपार्टी रेखाच्या घरी होती.

न्यू इयर सेलिब्रेशनचा विषय निघाला, ‘‘खरं तर जागा लहान पडते, नाही तर काही कार्यक्रम ठरवायला हरकत नाही.’’ अंजलीने म्हटलं.

रेखाने विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय कार्यक्रम आहे? पवनकडे जाणार का?’’

‘‘अजून ठरवलं नाहीए,’’ मालिनीने म्हटलं. ती काही तरी विचारात गढली होती.

‘‘मावशी, कसला विचार करताय?’’

सर्वांच्याकडे बघत मालिनी म्हणाली, ‘‘विचार असा करतेय की तुम्ही न्यू इयरची पार्टी माझ्या घरी करू शकता. भरपूर मोकळी जागा आहे, माझं रिकामं घर तुम्हा सर्वांच्या येण्याने आनंदाने भरून जाईल.’’

‘‘काय म्हणता? तुमच्या घरी?’’ आश्चर्याने सर्वांनी म्हटलं.

‘‘त्याला काय झालं? आपण दणक्यात करू पार्टी,’’ मोकळेपणाने हसत मालिनीने म्हटलं.

‘‘काय मस्त कल्पना आहे…पण मावशी. तुम्ही पवनच्या घरी…’’ रिया म्हणाली.

‘‘यावेळी सगळं वेगळंच करायचं आहे. नव्या वर्षांची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची. झकास सेलिब्रेशन करून. डिनर बाहेरून ऑर्डर करू. गेम्स खेळू,  मुलं कार्यक्रम देतील. डिनर करू…मजा येईल. खरं तर आपला हा ग्रूप जिथे जमतो ना, तिथे मजाच मजा असते.’’

रियाने तर आनंदाने मालिनीला मिठीच मारली. ‘‘व्वा! मावशी, किती मज्जा. जागेचा प्रॉब्लेम सुटला अन् इतका छान कार्यक्रमही ठरला. व्वा!’’

‘‘आणि बरं का मावशी, कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळ्याजणी मिळून सांभाळू सगळं. अन् खर्च सगळे मिळून वाटून घेऊयात,’’ सारिकाने सांगितलं.

‘‘अगं, तुम्हा सगळ्यांनाच सांगते,’’ मालिनीने म्हटलं, ‘‘फक्त न्यू ईयरच नाही, तुम्हाला एरवीही कधी काही समारंभाची पार्टी करायची असेल तर माझं घर मोकळंच असतं अन् माझ्या घरात तुम्ही सगळे आलात तर मलाही आनंदच वाटतो ना? एकाकी आयुष्यात तेवढंच चैतन्य अन् आनंद.’’

‘‘पण मावशी, पवन…घ्यायला आला तर?’’

‘‘नाही, मी जाणार नाही, इथेच राहाणार आहे.’’

त्यानंतर काही दिवसांनी सगळ्या मालिनीच्या घरी जमल्या. पार्टीला कोण कोण येणार? एकूण किती माणसं, मोठी किती, मुलं किती, मेन्यू काय, कुठून काय आणायचं, कोणावर कसली जबाबदारी असेल, म्युझिक, माइक, लायटिंग, तंबोला, मुलांचे कार्यक्रम सर्व गोष्टी अगदी तपशीलवार ठरल्या. लिहून काढल्यामुळे गडबडघोटाळ्याला वाव नव्हता. न्यू ईयर सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झाली.

तीस डिसेंबरला सकाळी पवनचा फोन आला. ‘‘आई, तुला घ्यायला येतोय, आवरून तयार राहा.’’

‘‘नाही रे बाळा, यावेळी मी येऊ शकणार नाही.’’

‘‘का?’’

‘‘माझाच काही कार्यक्रम ठरला आहे.’’

पवन वैतागून म्हणाला, ‘‘तुझा कसला कार्यक्रम? एकटीच तर आहेस तिथे…’’

‘‘नाही रे, एकटी नाहीए मी. खूप लोक आहेत इथे सोबतीला. न्यू ईयरची पार्टी ठेवलीय घरी.’’

‘‘आई, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? या वयात पार्टी करते आहेस? अन् इथे माझ्याकडे कोण करेल सगळं?’’

‘‘वयाचा विचार तर मी केला नाही…पण यावेळी मला जमणार नाही.’’

आता पवनने सूर बदलला, ‘‘आई, यावेळी तू एकटी नको राहूस. मुलाच्या घरी तुला अधिक चांगलं वाटेल ना?’’

‘‘एकटी तर मी गेली कित्येक वर्षं राहतेच आहे रे, त्याची मला सवय झालीए.’’

पवनने संतापून म्हटलं, ‘‘जशी तुझी इच्छा…’’ त्याने रागानं फोन आपटला.

त्याचा रागाने लाल झालेला चेहरा बघून नीतूने विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘आई येत नाहीए.’’

‘‘का?’’

‘‘तिच्या घरी पार्टी ठेवलीए तिने.’’

‘‘का? अन् कशाला? आता इथल्या पार्टीचं कसं व्हायचं? मला तर इतक्या लोकांचा स्वयंपाक जमणारच नाही.’’

‘‘पण आता तर तुलाच करावं लागेल.’’

‘‘छे: छे:, मला नाही जमणार.’’

‘‘पण मी सगळ्यांना बोलावून ठेवलंय.’’

‘‘तर मग हॉटेलमधून मागवून घे.’’

‘‘छे: छे:, फारच महाग पडतं ते.’’

‘‘मग बघ काय करायचं ते.’’

दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. शेवटी पवनने सर्वांना फोन करून आई आजारी असल्याने पार्टी कॅन्सल केल्याचं सांगितलं. दोघंही आईवर अन् एकमेकांवरही संतापलेली होती.

‘‘तू आईशी चांगली वागली असतीस तर आज असं खोटं बोलावं लागलं नसतं,’’

पवन म्हणाला, ‘‘आईने कामाशिवाय इथे राहिलेलं तुला खपत नव्हतं ना सतत, लगेच तिला पोहोचवाचा लकडा लावायचीस?’’

‘‘मला काय म्हणतोस? झी आई आहे, तूच तिला समजून घ्यायला कमी पडलास, मी तर सून आहे…मी काय करणार?’’

दोघं एकमेकांना दोष देत राहिली. भांडणं संपेना. दोघांची तोंडं फुगलेली.

हाउसी, लायटिंग, माइक, म्युझिक, गेम्स, मुलांची नाटकं, डान्स, चविष्ट जेवण या सगळ्याबरोबर ‘हॅप्पी न्यू ईयर’चा घोष. असं सगळं सगळं झालं. पण ते पवनकडे नाही, मालिनीच्या घरी. नववर्षांच्या शुभेच्छांच्या वर्षांवात मालिनी न्हाऊन निघाली. यापुढची सगळीच वर्षं अशी आनंदात जाणार होती.

बायको आणि कुक

मिश्किली * डॉ. सुरेश मोहन

शिक्षण संपलं. कॅम्पस सिलेक्शनमध्येच मला कोलकात्याला नामांकित कंपनीत छानशी नोकरी मिळाली. मी एका चांगल्या सोसायटीत टू. बी. एचके. फ्लॅट भाड्याने घेतला. नोकरीवर रूजू होताच आईबाबांनी एक मुलगी बघून माझ्यासाठी पसंतही केली. माझ्या संमतीसाठी त्यांनी मला गावी बोलावलं. फोटो दाखवला. मुलीची सर्व माहिती दिली अन् मुलगी बघायला मी रांचीला गेलो. तिथे एका छानशा रेस्टॉरंटमध्ये मी सलोनीला भेटलो. पनीर कटलेट, ग्रिल सॅण्डविच अन् कॉफी घेता घेता आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोललो.

मी तिला म्हटलं, ‘‘मी फार खादाड आहे. मला झणझणीत, चटपटीत, चवीचं खायला आवडतं.’’

‘‘मलाही तुम्हाला काही सांगायचं आहे,’’ कमी बोलणाऱ्या सलोनीने प्रथमच एक सलग वाक्य उच्चारलं. आत्तापर्यंत मी बोलत होतो, ती फक्त ‘हं, हं, हूं, उँहू’ एवढंच करत होती.

‘‘बिनधास्त बोल…कुणावर प्रेम आहे? कुठे अफेयर आहे? काही प्रॉब्लेम आहे?’’ मी एकाच श्वासात अनेक प्रश्न विचारले. मला जरा काळजी पडली; कारण एव्हाना मी गोऱ्या, घाऱ्या, सडपातळ, नाजूक बांध्याच्या, स्टायलिश अन् जरा लाजाळू वृत्तीच्या सलोनीच्या प्रेमात पडलो होतो

‘‘स्वयंपाक येत नाही. कधीच केला नाहीए. आमच्या एकत्र कुटुंबात कायम कुक, खानसामे वगैरे स्वयंपाकाला असतात. मला फक्त खाता येतं,’’ खाली मान घालूनच ती उत्तरली. तिला बहुधा हसायला येत असावं; कारण माझी चलबिचल तिच्या लक्षात आली होती.

‘‘नो प्रॉब्लेम! आपण स्वयंपाकाला बाई ठेवूयात. तसंही, कोलकात्याच्या चिपचिप उकाड्यात स्वयंपाक आय मीन कुकिंग म्हणजे कटकटच असते. गोरी गोरी सलोनी उगीचच सावळी व्हायची,’’ मी विनोद केला. अफेयर वगैरे नाही म्हणताना मी खूपच रिलॅक्स झालो होतो. कोणत्याही किमतीवर सलोनी मला हवी होती.

माद्ब्रयाकडून सलोनीला अन् तिच्याकडून मला होकार मिळताच एका महिन्याच्या आत आमचं ‘शुभमंगल’ पार पडलं. सलोनी माझी ‘जानेमन’, ‘सुप्रिया’, ‘दुलहनिया’, ‘घरवाली’, ‘मिसेस’ अन् हृदयाची राणी बनून माझ्या आयुष्यात आली. आम्ही गोवा, मुंबई, माथेरानला हनीमून साजरा केला. सिनेमा बघितला. बोटिंग केलं, सूर्य न्याहाळला, घोड्यावर बसलो, स्ट्रॉबेरी आइस्क्रीम खाल्लं, रजा संपवून परत कोलकात्याला यायला निघालो तेव्हा सलोनीने म्हटलं, ‘‘कुकची व्यवस्था झाली की मी येते.’’

मी ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना बायकोची अट सांगितली. सोसायटीच्या सिक्युरिटी ऑफिसमध्येही कुकसाठी सांगून ठेवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच कुक हजर झाली. सुट्टीचा दिवस होता. मी वर्तमानपत्रं वाचत होतो.

तिच्याकडे निरखून बघितलं. सावळी, मोठाल्या पाणीदार डोळ्यांची, धारदार नाकाची, हडकुळी नाही पण जाडही नाही अशा बांध्याची एक तरुण स्त्री माझ्यासमोर उभी होती. एकूणात, छानच होती. आकर्षक होती. साधा पण स्वच्छ धुतलेला सलवार सूट अंगावर होता.

तिचा इंटरव्ह्यू घ्यायची माझी अजिबात तयारी नव्हती. मी गोंधळलो होतो.

‘‘स्वयंपाक करायला येतो?’’ मी बावळटासारखं विचारलं.

‘‘मला स्वयंपाक आला नसता तर मी दोन फ्लॅटमध्ये स्वयंपाक केला असता का?’’ सावळी सुंदरी निर्विकारपणे म्हणाली.

‘‘आलू पराठे येतात? बनवतेस?’’ आलू पराठे, लोणी, दही अन् आंब्याचं लोणचं माझे वीकपॉइंट होतं.

सावळीला इंटरव्ह्यू देण्याचा अनुभव असावा. ‘‘नाश्त्यात ६ आलू पराठे किंवा १२ पुरीभाजी, लंचसाठी १० चपात्या, कोणतीही एक भाजी, रात्रीच्या जेवणात ६ चपात्या, भात, डाळ किंवा रसदार भाजी, सुकी भाजी. रविवारी भात चिकन, सलाड किंवा मटण आणि चपाती +भात, चिकन, मटण बनवले तर माझ्या मुलांसाठीही थोडंसं घेऊन जाईन. नाश्त्याचे ५०० रुपये, लंचसाठी १००० रुपये, डिनरचे १०० रुपये महिना घेईन. एका महिन्यात दोन दिवस सुट्टी घेईन. मान्य असेल तर बोला, नाही तर मी निघते,’’ एका श्वासात सगळं बोलून ती लिफ्टपाशी जाऊन उभी राहिली.

‘‘सगळं मंजूर…सगळं मंजूर. एक तारखेपासून कामाला ये,’’ मी घाईने म्हणालो. मलाही स्पष्टवक्ती, निर्विकारपणे बोलणारी सावळी सुंदरी फारच आवडली होती.

रात्री मी सलोनीला फोनवर सविस्तर रिपोर्ट दिला. सावळ्या सुंदरीचं वर्णन करताना अधिकच रसभरीतपणे केलं. स्वत:च्या बावळटपणाची ही कबुली दिली.

‘‘सुंदर आहे म्हणता? नाव काय तिचं?’’ सलोनीने विचारलं.

‘‘नाव तर विचारायलाच विसरलो. तिनेही सांगितलं नाही…’’

‘‘तर एकूणात साहेबांना सावळी सुंदरी आवडली आहे…म्हणजे ती आता तुमची प्रिया होणार?’’

‘‘तुला स्वयंपाक येत नाही त्याची काहीतरी भरपाई द्यावीच लागेल ना?’’ मीही मानभावीपणे म्हणालो.

‘‘मी घारीची नजर घेऊन घरात फिरेन. रिटायर्ड कर्नलची मुलगी आहे, हे विसरू नका. तिच्याचकडून कुकिंग शिकून तिचं कोटमार्शल करेन.’’ सलोनीने धमकी दिली.

३१ तारखेच्या दुपारी विमानाने सलोनी कोलकात्याला येत होती. मी संपूर्ण आठवड्याची रजा टाकली होती. एयरपोर्टवरून येताना आम्ही घरासाठी, विशेषत: स्वयंपाकघरासाठी सामान खरेदी केलं. (सामानाची यादी सावळ्या सुंदरीने वॉचमनच्या हाती पाठवून दिली होती.) रात्रीचं जेवण बाहेर रेस्टॉरंटमध्ये आटोपून आम्ही घरी आलो. आम्ही दोघांनी मिळून सामान स्वयंपाकघरात मांडलं. पुढलं सगळं ती सुंदरी बघणार होती.

सकाळी साडेसहाला सावळी दारात हजर. आदराने, नम्रतेने सलोनीला भेटली. दोघींचं बोलणं झालं. लगेच ती ब्रेकफास्टच्या तयारीला लागली, तासाभरात टेबलवर सर्व सरंजाम मांडून निघून गेली.

आम्ही ब्रेकफास्टसाठी आलो. सावळीने कुरकुरीत, चटपटीत सहा आलू पराठे बनवले होते. दुधीची साधी पण चविष्ट भाजी होती. लोणी, दही, लोणच्याची बाटली, थर्मांसमध्ये गरम चहा, सर्व काही व्यवस्थित मांडून गेली होती.

‘‘आलूपराठ्यांसोबत दुधीची भाजी हे कॉम्बिनेशन थोडं विचित्र आहे, पण भाजी खरोखर चविष्ट आहे.’’ मनापासून दाद देत गोरी, घारी सलोनी म्हणाली.

‘‘पराठेही छानच आहेत. पण ते खाऊन माझं समाधान नाही झालं.’’ मी तक्रार केली.

‘‘मला दोन पुरेत. तुम्ही एक आणखी घ्या.’’ उदारपणे सलोनी म्हणाली. आम्ही तृप्त मनाने डायनिंग टेबलवरून उठलो. सावळी उत्तम कुक असल्याबद्दल आमचं दोघांचं एकमत झालं.

सावळी प्रामाणिकपणे काम करत होती. व्हेज, नॉनव्हेज सगळेच पदार्थ फार छान करायची. काम स्वच्छ होतं. चपळपणे सर्व आवरायची. राहाणीही छान पण स्वच्छ. तिच्या शार्प अन् मोहक फीचर्सवर मी लट्टू होतो.

सलोनीही खुशीत होती. मुळचा गोरा रंग अधिकच नितळ व गुलाबी झाला होता. मनासारखा पैसा, हवं ते करण्याचं स्वातंत्र्य, नवऱ्याकडून सतत कोडकौतुक यामुळे ती अधिकच रसरशीत दिसू लागली. तिला सोडून मला ऑफिसलाही जाण्याची इच्छा होत नव्हती. ती मला बळजबरीने घराबाहेर लोटायची. ऑफिसातही तिच्या मादक देहाचा सुगंध मनात दरवळाय. मी ऑफिसातून लवकर घरी निघून यायचो. मग ती रागवायची. मला जवळ येऊ द्यायची नाही.

सलोनी सावळीलाही वेळ देत होती. अनेक बारीकसारीक गोष्टी तिला विचारून घेत होती. बरंच काही शिकली होती. सावळी आली नाही तर तिच्यासारखेच पराठे अन् इतर जिन्नस तयार करून खायला घालत होती.

सलोनी खरोखरच चतुर होती. सावळीवर ती नजर ठेवायची, पण सावळीला त्याची शंकाही येत नव्हती. माद्ब्रझ्या बाबतीत तिने मला ‘उल्लू’ बनवण्याचं धोरण ठेवलं होतं. मला ती पूर्णपणे तृप्त करायची. ती माझी गृहस्वामिनी होती, सुप्रिया होती, सुकांता होती, स्वप्नसुंदरी होती, आकाशातून उतरलेली परी होती.

सावळीचं आकर्षण तरीही होतं, हे रिटायर्ड कर्नलच्या, घारीसारखी नजर असलेल्या पोरीच्या लक्षात आलं. तिने प्रेमाने सावळीची पाठवणी केली. दोन महिन्यांचा पगार अधिक दोन नवे सलवार सूट शिवाय तिच्या दोन्ही मुलांना नवे कपडे मिळाल्यामुळे सावळी सुखावलीच होती. ‘‘गरज पडली तर पुन्हा बोलावीन तेव्हा नक्की ये हं.’’ असंही सलोनीने तिला जाताना सांगितलं होतं. माझ्या नकळत कोर्टमार्शल झालं होतं.

‘‘तू छान करतेस सगळं, पण बाईला का काढलीस?’’

‘‘ती फार आवडते?’’

‘‘तसं नाही, पण तू घामाने भिजशील.’’

‘‘स्वयंपाकघरात एसी बसवा.’’

‘‘घामाचा वास तरीही येईल.’’

‘‘अंगावर यू डी कोलोनचा स्प्रे मारा.’’

‘‘अगं पण तिला करू दिलं असतं काम…’’

‘‘मी करते ना? प्रॉब्लेम काय आहे?’’

खरंच, प्रॉब्लेम म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही…जाऊ दे. माझी गोरी, घारी सलोनी आनंदात आहे अन् मला खूष ठेवते आहे, हेच पुरेसं आहे. अन् तसंही मला या कर्नलच्या पोरीपासून थोडं भिऊन राहायलाच हवं. न जाणो, उद्या माझंच कोर्टमार्शल झालं तर?

रहस्यभेद

कथा * प्रियदर्शिनी

त्या वेळच्या किटी पार्टीची थीम ‘वनपीस’ होती. पार्टी निशाच्या घरी होती. निशा म्हणजे एकदम मॉडर्न, स्मार्ट, स्लिम अॅन्ड फिट. अशा थीम्स तिलाच सुचायच्या. मागची भिशी अमिताकडे झाली,  तेव्हाच निशानं सांगून टाकलं होतं, ‘‘माझ्या पार्टीची थीम ‘वनपीस’ आहे.’’

यावर गोल गुबगुबीत नेहानं तिला म्हटलं, ‘‘वेड लागलंय का तुला? सोसायटीत कार्टून म्हणून बघतील आमच्याकडे. आमचं काय वय आहे का ‘वनपीस’ घालण्याचं?’’

निशा तशी आडमुठीच, थोडी हट्टीसुद्धा. तिनं शांतपणे म्हटलं, ‘‘जो घालणार नाही, त्याला दंड भरावा लागेल.’’

नेहानं गुरूगुरत विचारलं, ‘‘किती घेशील दंड? १०० रुपयेच ना? दिला…’’

‘‘नाही, शंभर रुपये नाही, किमान हजार रुपये, शिवाय हॉटेलात डिनर.’’

दोघींचं बोलणं ऐकणाऱ्या अंजलीनं गोडीनं म्हटलं, ‘‘निशा, प्लीज…‘वनपीस’ नको ना, दुसरं काही ठरव. का उगीच लोकांना या वयात आपल्यावर हसण्याची संधी द्यायची?’’

‘‘नाही. सगळ्यांनी वनपीसमध्ये यायचं. ठरलं म्हणजे ठरलं.’’

रेखा, मंजू, दीया, अनिता, सुमन, कविता, नीरा या सगळ्या आपापल्या प्रोग्रॅम ठरवू लागल्या.

रेखानं म्हटलं, ‘‘तू तशी हट्टीच आहेस, पण निशा अगं, माझ्या घरात सासूसासरे आहेत याचा तरी विचार कर. माझ्या नवऱ्याला एक वेळ मॅनेज करेन मी, पण सासूबाईंचं काय? त्यांच्या समोरून वनपीस घालून कशी निघणार मी?’’

‘‘तर पर्समध्ये घालून आण. माझ्या घरी येऊन बदलता येतं ना?’’ निशाजवळ उत्तर तयार होतं.

‘‘हो हो, हे जमेल बरं का?’’

मंजू, दीया, अनिता यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांच्याकडे असे ड्रेसेस असायचे. त्या घालायच्याही. पण नीरा, अनिता, सुमन आणि कवितानं त्यांची अडचण सांगितली. ‘‘आमच्याकडे वनपीस ड्रेस नाहीए. मग?’’

‘‘मग? मग काय? विकत घ्या. असे प्रसंग तर आता येतच राहतील?’’ शांतपणे निशानं म्हटलं.

त्याही सगळ्या ड्रेस विकत घ्यायला तयार झाल्या.

अंजलीचा प्रॉब्लेम जरा वेगळा होता. ती म्हणाली, ‘‘अगं, अनिलना असे मॉडर्न ड्रेस आवडतात, पण माझी तरूण मुलं हल्ली फारच कटकट करत असतात. त्यांना मी साडीखेरीज इतर कोणताही पोशाख घातलेला खपत नाही…मला नाही वाटतं की मला ती पोरं वनपीस घालू देतील.’’

‘‘मग तूही घरून निघताना साडी नेस. पर्समध्ये ड्रेस ठेवून घेऊन ये. माझ्याकडे येऊन बदल की झालं.’’

अंजलीनं कसंबसं ‘हो’तर म्हटलं तरी सगळ्यात जास्त टेंशन तिलाच आलं होतं.

निशाकडच्या किट्टीचा दिवस जवळ येत होता. अंजली घरच्या सगळ्यांबरोबर रात्रीचं जेवण घेत होती. ती गप्प गप्प होती. तिची २३ वर्षांची मुलगी तन्वी अन् २१ वर्षांचा मुलगा पार्थ दोघांनीही विचारलं, ‘‘मॉम, कसला विचार करते आहेस?’’

‘‘काही नाही.’’ एक नि:श्वास सोडून अंजलीनं म्हटलं.

नवऱ्यानं फिरकी घेत म्हटलं, ‘‘काही तरी बोल गं! इतक्या शांततेत जेवायची सवय नाहीए आम्हाला.’’

अंजलीनं रागानं त्यांच्याकडे बघितलं तशी तिघंही हसले. अंजलीनं मग सांगूनच टाकलं, ‘‘पुढल्या आठवड्यात निशाकडे आमची भिशी आहे.’’

‘‘अरे व्वा!’’ तन्वी आनंदानं चित्कारली. निशा आंटी तर नेहमीच मस्त मस्त थीम्स ठेवते…यावेळी काय आहे थीम?’’

अंजलीनं सांगितलं, ‘‘वन पीस.’’

‘‘काय?’’ पार्थ केवढयांदा दचकला. तन्वीला ठसका लागला.

पार्थनं ताडकन् म्हटलं, ‘‘नाही आई, तू नको हं घालूस…’’

‘‘का?’’

तन्वीनं म्हटलं, ‘‘अगं, प्रत्येक पोशाख वापरण्याचं एक वय असतं ना? आणि कसं, निशा आंटीला सगळं छान दिसतं. तुला नाही छान दिसणार…पुन्हा आम्हाला कधी सवय नाही तुला अशा पोशाखात बघायची…ते काही नाही मॉम, तू साडीच नेस.’’

शांतपणे अंजलीने म्हटलं, ‘‘मी तर विचार करतेय, तुझा काळा वनपीस ट्राय करूयात का म्हणून.’’

चिडून पार्थनं म्हटलं, ‘‘नो मॉम, अजिबात नाही. अगं, गुडघ्याच्या थोडा खाली येणारा तो ड्रेस तू कशी काय घालू शकतेस? ताईच घालते तर मला आवडत नाही…’’

तन्वीनं त्याला बजावलं, ‘‘लहान आहेस तू. लहानांसारखंच बोल.’’

अनिल हसत हसत सर्व संवाद ऐकत जेवत होते.

अंजलीनं म्हटलं, ‘‘तुम्ही गप्प का? बोला ना काहीतरी?’’

‘‘तुमचं संभाषण ऐकणंच जास्त छान वाटतंय. वनपीसवर काय अन् केव्हा निर्णय होतोय त्याची वाट बघतोय मी.’’ अनिल हसत म्हणाले.

जेवणं आटोपेपर्यंत त्या वनपीसवर चर्चा सुरू होती. दुसऱ्या दिवशी तन्वी आणि पार्थ कॉलेजात गेले. सुनील त्यांच्या ऑफिसात. मोलकरीणही कामं आटोपून गेल्यावर दुपारी अंजली घरात एकटीच होती. तिनं लेकीचं कपाट उघडलं.

तन्वीचं कपाट कायम विस्कटलेलं, पसरलेलं असायचं. त्यावरून अंजलीची खूप चिडचिडही व्हायची. पण आता चिडचिड करायला वेळ नव्हता. अंजलीनं तन्वीचा तो काळा वनपीस शोधायला सुरूवात केली. शेवटी एकदाचा तो चुरगळलेल्या अवस्थेत तिला दिसला. तिनं तो हातात घेतला, त्याचा अंदाज घेतला अन् तिला खुदकन् हसू आलं. गाणं गुणगुणत तिनं त्या ड्रेसला इस्त्री केली अन् मग तो ड्रेस अंगावर चढवला. छान बसला की तिच्या अंगावर. तिनं आरशात बघितलं…ती छानच दिसत होती. पोटऱ्यांपर्यंतचा त्या घोळदार पण बिनबाह्यांच्या वनपीसमध्ये आरशात दिसणाऱ्या स्वत:च्या रूपावर अंजली खुश झाली. या वयात तरूण लेकीचा ड्रेस अंगात शिरतोय ही बाब नक्कीच सुखावणारी होती. तन्वी थोडी बारीक होती, पण अंजलीच्या अंगावर ड्रेस छान बसला होता.

मागून, पुढून, बाजूनं, सगळीकडून बघून ड्रेस चांगला बसत असल्याची अन् शोभत असल्याची खातरजमा करून तिनं सुटकेचा श्वास घेतला. आता मैत्रिणीबरोबर तिलादेखील मजा करता येणार होती. ही मुलं ना, फारच कटकट करतात. जाऊ दे. घरी कुणालाच काही समजणार नाहीए. सांगायचं नाहीच म्हटल्यावर प्रश्नच कुठं येतो? तिनं घाईनं निशाला फोन केला. ‘‘निशा मी थोडी लवकर येईन. कपडे तुझ्याकडेच बदलेन.’’

‘‘ये की! अगदी मजेत!’’

किट्टी पार्टीच्या दिवशी अनिल, पार्थ अन् तन्वीसोबत सकाळी ब्रेकफास्ट घेत असताना अंजली बऱ्यापैकी उत्साहात होती. चेहरा आनंदानं उजळला होता.

‘‘मॉम, आज तुमची किटीपार्टी आहे का?’’ पार्थनं विचारलं.

‘‘हो, आहे ना.’’

‘‘मग तू काय घालणार आहेस?’’

‘‘साडी.’’

अनिलनं विचारलं, ‘‘कोणती?’’

‘‘मागच्या महिन्यात घेतली होती ना? निळी…तिच.’’

‘‘हो गं आई, तू साडीत खूप छान दिसतेय.’’ तन्वीनं म्हटलं.

पार्थ म्हणाला, ‘‘मॉम, तू किती छान आहेस गं. आमचं सगळं म्हणणं ऐकतेस…तो वनपीसवाला ड्रामा इतर बायकांना करू देत…यू आर बेस्ट मॉम.’’

मनातल्या मनात अंजलीनं म्हटलं, ‘तुम्ही काहीही म्हणा, मला काय करायचंय ते मी ठरवेन. घरातले सगळे नियम माझ्यासाठी असतात. इतरांनी हवं ते करायचं अन् मी यांच्या मर्जीनं चालायचं.’ मनांतल्या मनांत तिनं हसूनही घेतलं.

किटीपार्टीची वेळ ४ ते ६ असायची. सहानंतर सगळ्याजणी आपापल्या घरी जायला निघायच्या. सर्वांची वय ४०-४५च्या दरम्यानची होती. मुलं शाळा-कॉलेजात, नवरे ऑफिसात त्यामुळे वेळ बराच मोकळा मिळायचा. घरून अंजली साडी नेसूनच बाहेर पडणार होती. त्यामुळे कॉलनीत कुणी बघितलं तरी प्रॉब्लेम नव्हताच. घरी परततानाही ती साडीतच असणार होती.

अंजली खूपच उत्तेजित होती. ती चारच्या आधीच निशाच्या घरी पोहोचली. निशा आधीच सुंदरशा वनपीसमध्ये तयार होती. अंजलीनंही साडी बदलून तन्वीचा ड्रेस घातला.

निशानं वरपासून खालपर्यंत अंजलीला बघितलं अन् ती उत्फुर्तपणे म्हणाली, ‘‘व्वा! अंजली यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट!’’

अंजली सुखावली. ‘‘थोडा घट्ट वाटतोय का गं?’’

‘‘नाही. छान फिटिंगचा वाटतो. आज बघ, खूप मज्जा येणार आहे.’’

तेवढ्यात रेखा आली. तिनंही कपडे बदलले. बघता बघता सगळ्याजणी आल्या. सगळ्या घरूनच तयार होऊन आल्या होत्या. सगळ्यांनी एकमेकींची प्रशंसा केली अन् खरं तर सगळ्याच जणी खरोखर छान दिसत होत्या. काहीतरी वेगळं केल्याचा आनंद, काहींना घरातल्यांपासून लपवून करण्याचा आनंद अशा सगळ्यामुळे वातावरण छानच झालं होतं. मग जबरदस्त फोटो सेशन झालं. मग कोल्ड्रींक्स, स्नॅक्स, खेळ…निशानं खाण्यासाठी छान छान पदार्थ केले होते. सर्वांनी आडवा हात मारला. नेहमीप्रमाणे, खरं तर नेहमीपेक्षाही अधिक मजा आली.

साडे सहा वाजले तशी सर्वांची निघायची लगबग सुरू झाली. ज्यांनी घरी जाताना कपडे बदलायचे होते, त्यांनी कपडे बदलले. त्यावरून पुन्हा एकदा चेष्टामस्करी, विनोद झाले.

निशा म्हणाली, ‘‘आज आपण लहान मुलांसारखं खोटं वागलो आणि बोललो. खरं तर हे तेवढंसं बरोबर नाही, तरीही मज्जा आली हे नाकारता येणार नाही…’’

‘‘अन् आता पुन्हा अगदी लहान मुलांसारखेच निरागस चेहरे घेऊन आपण आपल्या घरी जातो आहोत.’’ रेखाच्या या म्हणण्यावर पुन्हा एकदा सगळ्या हसल्या.

अंजली घरी पोहोचली, तोवर सात वाजले होते. नवरा अन् मुलं घरी आलेली होती. घराच्या लॅचची एकेक किल्ली प्रत्येकाकडे असायची. त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. तिनं घरात प्रवेश करताच पार्थनं विचारलं, ‘‘तुमची पार्टी कशी झाली मॉम?’’

‘‘फारच छान,’’ अंजलीनं म्हटलं. पार्थ हसला.

‘‘मॉम, साडीत तू छान दिसतेस हं.’’ तन्वीनं हसत म्हटलं. ‘‘थँक्स’’ म्हणत अंजली सोफ्याच्या खुर्चीवर बसली. तसं अनिलनं विचारलं, ‘‘तर तुमची पार्टी झक्कास झाली?’’ तो ही हसत होता.

‘‘आमची पार्टी मस्तच झाली…तुम्हाला मात्र भूक लागली असेल ना?’’

‘‘नाही, तन्वीनं चहा केला होता अन् येताना मी गरम पॅटिस आणले होते. त्यामुळे याक्षणी आम्हाला भूक नाहीए.’’ अनिलनं म्हटलं अन् मग हसत म्हणाला, ‘‘छान दिसते आहेस साडीत.’’

आता मात्र अंजलीला शंका आली. नवऱ्याचं हसणं साधं नाहीए हे इतक्या वर्षांच्या संसारानंतर तिला समजलं होतं. मुलंही मघापासून हसातहेत. तिनं आळीपाळीनं प्रत्येकाकडे बघितलं. मग विचारलं, ‘‘तुम्ही मघापासून हसताय कशाला?’’

अनिलनं म्हटलं, ‘‘तुला बघून…’’

‘‘का? मला काय झालंय?’’

तिघं पुन्हा खदखदून हसायला लागली. एकमेकांना टाळ्या दिल्या अन् मग अनिलनं म्हटलं, ‘‘कशा दिसत होत्या तुझ्या मैत्रिणी ‘वनपीस’मध्ये.’’

‘‘चांगल्या दिसत होत्या…’’

‘‘तू ही छान दिसत होतीस…’’

अंजली खुदकन् हसली तसं अनिलनं म्हटलं, ‘‘तन्वीच्या ब्लॅक वनपीसमध्ये.’’

अंजली एकदम दचकली. ‘‘भलंतच काय? मी तर साडी नेसूनच बसलेय ना तुमच्या समोर?’’

‘‘हो, पण तिथं वनपीसमध्ये छान दिसत होतीस, घालत जा तूही…’’ अनिलनं म्हटलं. पण अंजली गोंधळली. तिनं तर तो ड्रेस आता घरीही आणला नव्हता. उगीच घरी यांना कळेल म्हणून.

‘‘अगं, तुझ्या मोबाइलमध्ये फेसबुक ओपन कर.’’ अनिलनं म्हटलं.

अंजलीनं घाईघाईनं फोन बघितला. या सगळ्याजणी घराबाहेर पडताच निशानं त्यांचं फोटो सेशन फेसबुकवर टाकलं होतं. अनिल, तन्वी, पार्थ सगळेच तिच्या फेंड्सग्रुपमध्ये असल्यानं अंजली घरी पोहोचण्याआधीच तिचे फोटे घरच्यांनी बघितले होते.

तिघांनाही फोटो लाइक करून छान छान कॉमेंट्सपण दिल्या होत्या. एवढं सगळं घडून गेल्यावर आता लपवण्यासारखं उरलं तरी काय होतं? अंजलीनं दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला अन् तिलाही मग या तिघांसारखंच हसायला यायला लागलं. हसता हसता ती म्हणाली, ‘‘जळलं मेलं ते फेसबुक…चांगलीच फजिती केलीन की माझी.’’

प्रेमाचे धागे

कथा * अर्चना पाटील

सौम्य अफिसमधून रात्री आठ वाजता घरी परतला. शुज काढून हॉलमध्येच बसला.

‘‘जेवण वाढू का तुम्हाला,’’ काव्याने विचारलं.

‘‘जेवण नको आहे मला. तू इथे बस. माझ्यासमोर.’’

‘‘मी बसते, पण तुम्ही जेवून तर घ्या आधी.’’

‘‘भुक नाहीए मला. तुला इथे बसायला सांगतो आहे. तेवढं कर.’’

‘‘काय झालंय?’’

‘‘हेच मला तुला विचारायचं आहे. काय प्रॉब्लेम आहे? हनीमुनची टुर कँन्सल का केलीस तू आईबाबांसमोर? आठ दिवस गेलो असतो घराबाहेर फिरायला. तेवढाच एकांत मिळाला असता आपल्याला.’’

‘‘मला नको आहे एकांत. मी या घरात केवळ कस्तुरीची आई म्हणून आले आहे. तुम्ही माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नका.’’

‘‘याचा अर्थ काय? नुसती नाटके नकोत मला. तुला जर एक बायको म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नव्हते तर लग्न का केलं माझ्याशी? जगात मुलींची काही कमी होती का? कस्तुरीसाठी आया तर भाडयानेही घेऊन आलो असतो मी. अनन्याच्या अपघाती निधनानंतर मला पुन्हा एकदा आयुष्याची नव्याने सुरूवात करायची होती आणि कस्तुरीची मावशी असल्याने तू परक्या बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेशील एवढेच या विवाहामागचे कारण आहे.’’

काव्या निरुत्तर झाली होती. आठ दिवस झाले होते लग्नाला. ती सतत सौम्यला टाळत होती. पण आज सासुसासरे गावी निघून गेले. त्यामुळे सकाळपासूनच तिला रात्रीची भीती वाटत होती. कारण आज सौम्यला टाळणे शक्य नव्हते.

‘‘तुम्ही जेवून घ्या आधी. आपण शांततेत बोलू नंतर.’’

‘‘कस्तुरी ?झोपली का?’’

‘‘हो, केव्हाच झोपली. तुम्ही जेवून घ्या ना. मी ताट वाढते.’’

काव्या किचनमध्ये ताट वाढायला गेली. सौम्यसुद्धा तिच्या मागेमागे गेला. ताट हातात घेऊन काव्या उभी होती.

‘‘जेवण नको आहे मला, तू फक्त कस्तुरीची आई आहेस ना मग माझ्या पोटाची चिंता कशाला करते आहेस? तू आधी बेडरूममध्ये चल. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवीत.’’

‘‘आपण आईबाबांच्या खोलीत जाऊ. बेडरूममध्ये कस्तुरी झेपली आहे.’’

सौम्य काव्याचा हात हातात पकडूनच तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन आला. काव्या एका भिंतीला चिटकून काहीशी घाबरतच उभी होती. सौम्य आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हते. लग्नानंतर प्रथमच ते दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ उभे होते.

‘‘आज मला एक मुलगी आहे. पण माझं नाव चालवायला मला आणखीन एक मुल हवंय. त्यासाठीच मी पुन्हा लग्न केले आहे. हे वाक्य कायम लक्षात असू दे आणि तुझ्यासोबत बोलताना आणि वागताना चुकलो तर तुमचं हे चुकत आहे असं बोलायलाही विसरू नको. बाकी तुझं नाटकं चालू देत.’’ सौम्य संतापात बोलून निघून गेला.

एक आठवडा ताणतणावातच गेला आणि आईबाबा गावाहून परत आले. सौम्यसुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता. दुपारच्या जेवणाला सगळे एकत्रच बसले. सौम्य एकटक काव्याकडे बघत होता. त्याच्या नजरेने ती घाबरून त्याच्याकडे पाहतच नव्हती. आईबाबा घरात असले की काव्या बिनधास्त असे, कारण सौम्यला टाळणे सहज जमत असे. जेवत असताना सौम्यला फोन आला. तेवढया वेळात सर्वजण जेवण करून निघून गेले. किचनमध्ये केवळ सौम्य आणि काव्या उरले. काव्याचे जेवणही झाले होते. पण सौम्यला जेवण वाढण्यासाठी तिला तिथेच त्याच्याशेजारी मांडी घालून बसावे लागले. सौम्य जेवत होता, पण काव्याला सतत भीती वाटत होती.

‘‘गुळाचा काला कर मस्त. कधीपासून खाल्ला नाही आहे.’’

‘‘काय?’’

‘‘येत नाही का तुला?आईला बोलव मग.’’

काव्याने कटरने गुळ चिरायला सुरूवात केली. सौम्य काव्याच्या घाबरट हालचालींचा आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता. काव्याने पोळी आणि गुळाचा काला करताच कस्तुरीसुद्धा तेथे पोहोचली.

‘‘अय्या मम्मीपण असाच काला बनवायची ना पप्पा.’’

कस्तुरीच्या त्या वाक्याने नीरव शांतता पसरली. सौम्यसुद्धा काला न खाताच उठून गेला. काव्यालाही वाईट वाटले. दिवसभर सौम्य बेडरूममध्येच होता. पण काव्या चुकुनसुद्धा बेडरूममध्ये आली नाही. संध्याकाळी आईबाबा गावातच लग्नाला जाणार होते.

‘‘सौम्य, कस्तुरी आमच्यासोबत लग्नाला येते आहे. तुम्ही दोघंही कुठेतरी फिरून या. बरं मग निघू आम्ही.’’ बाबा बोलून निघून गेले.

काव्या हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. सौम्यने आईबाबा जाताच घराचा दरवाजा आतून बंद केला आणि काव्याजवळ येऊन बसला. सौम्य जवळ येताच काव्या सावरून बसली.

‘‘किती दिवस एकांत टाळशील? लग्नाची बायको आहेस तू माझी. तू कितीही ठरवलं तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबतच घालवायची आहे. काही दिवसांनी माझेच नाही तुझेही आईबाबा नातू हवा म्हणून तुला त्रास देतील.’’ सौम्य नेहमीप्रमाणे बोलून निघून  गेला. काव्यासुद्धा नजर खाली करून बसुन राहिली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सौम्य कस्तुरीला शाळेत सोडण्यासाठी काव्यालाही घेऊन गेला. कस्तुरीला शाळेत सोडल्यानंतर टुव्हीलर घराच्या रस्त्याने न येता वेगळयाच दिशेने धावत होती. काव्या बेचैन झाली.

‘‘तुम्ही कुठे नेत आहात मला. तुम्ही गावाच्या बाहेर का जात आहात? मला घरी जायचं आहे. गाडी थांबवा. तुम्हाला कस्तुरीची शपथ आहे.’’

सौम्यने गाडी थांबवली. रस्त्यावर कोणीच नव्हते. काव्या पटकन खाली उतरली. सौम्यसुद्धा खाली उतरला.

‘‘मी काही चुकीचं वागतोय का?’’

‘‘या प्रश्नाचे उत्तर नाहीए माझ्याकडे. मला घरी सोडा.’’

‘‘नाही सोडणार घरी. मला जिथे जायचं असेल, तिथेच जाईन. तुझ्या बापाला फोन करतो तू अशी नाटकं करते आहेस रस्त्यावर हे सांगायला,’’ सौम्य संतापात बोलत होता.

‘‘मी बसतेय गाडीवर,’’ काव्याच्या डोळयात पाणी आलं. बोलताना…मधूनमधून दोघांचा एकमेकांना हलकासा स्पर्श होत होता. टुव्हीलर एका कॉलेजसमोर थांबली. एक तासाचा प्रवास केला दोघांनी. पण रस्ताभर शांतता होती. कॉलेज पाहताच काव्या गोंधळली. सौम्यने काव्याचं लॉ कॉलेजला अॅडमिशन घेतलं. अॅडमिशन फॉर्म भरताच टुव्हीलर सपसप घराच्या दिशेने निघाली. तोपर्यंत कडक ऊन पडलं होतं.

‘‘तुम्ही रूमाल बांधाना डोक्याला,’’ काव्या बोलायचा प्रयत्न करत होती.

‘‘आयुष्याने इतके चटके दिले आहेत की आता या उन्हाचं काही वाटत नाही. तू व्यवस्थित बस.’’

काव्याला खुपच शरमल्यासारखे होत होते. सौम्य किती चांगल्या मनाने मला आणत होता आणि मी विनाकारणच त्याच्याशी भांडत होते. आजही सौम्यने अॅडमिशनसाठी रजा टाकली होती. दुपारच्यावेळी काव्या बेडरूममध्ये पाठ टेकायला आली. सौम्यने  रोमँटिक गाणी लावली लॅपटॉपवर. अभी ना जाओ छोडकर…ये हँसी वादीयाँ…तुम मिले, दिल खिले…प्रत्येक गाणं काव्याला आवडत होतं. ती सौम्यकडे पाठ करून बेडवर झेपली होती, पण गालातल्या गालात हसत होती. तेवढयात काव्याच्या आईचा फोन आला.

‘‘कशी आहेस बेटा. बरं ते जाऊ दे. जावईबापूंना म्हणा पन्नास हजार मिळाले. तात्यांना अॅडमिट केलं होतं दवाखान्यात. आम्ही पगारावर फेडू म्हणा त्यांना. तू काळजी करशील म्हणून बोलले नाहीत तुला. आभार मानायला फोन केला गं मी. जावईबापूंना नाराज करू नकोस. खूपच हळव्या मनाचे आहेत ते. आपली अनन्या त्यांच्या आयुष्यातुन अचानक निघून गेली, त्यामुळे खुप खचले गं ते. पण मन मोकळं करत नाहीत ते. आता तुच अनन्याची जागा भरून काढ.’’

संध्याकाळी स्वत:हून काव्याने सौम्यसाठी शिरा बनवला. रात्री जेवण झाल्यावर स्वत:हून गुळपोळीचा काला केला.

‘‘बापरे, कस्तुरी तुझी नवी मम्मी खुपच खुष दिसते आहे आज’’

‘‘हो, कारण मम्मा आता वकील होणार आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार.’’

‘‘कस्तुरी, असं बोलू नये बाळा. तू जा आजीजवळ आणि झोप.’’

‘‘मी चुकीचे ऐकतोय का, कस्तुरीची मम्मी. तू तिला आजीजवळ पाठवते आहेस झोपायला.’’

काव्या लाजली आणि पटापट किचनमधील पसारा आवरून बेडरूममध्ये आली.

‘‘आईचा फोन होता संध्याकाळी. कौतुक करत होती तुमचं.’’

‘‘मी तर सगळयांनाच आवडतो तू सोडून.’’

‘‘मी कुठे म्हटले की तुम्ही मला आवडत नाहीत.’’

‘‘म्हणजे मी तुला आवडतो. मग इतके दिवस माझ्यापासून दुरदुर का पळत होती?’’

‘‘थोडा वेळ हवा होता मला. अनन्या गेली आणि लगेच तिच्या अर्धवट संसारात गुंतवलं मला आईबाबांनी. मला ग्रॅजुएशननंतर लॉ करायचे होते. या लग्नामुळे माझे शिक्षणसुद्धा थांबले. याशिवाय तुम्ही मला अनन्याची जागा कधीच देणार नाही असं वाटत होतं मला.’’

‘‘बावळट आहेस तू, अनन्या माझा भुतकाळ होती. मी तुला आधीच सांगितलं होतं की मला आयुष्याची नवीन सुरूवात करायची आहे म्हणून मी हे लग्न केलं आहे.’’

‘‘मला माझी चुक समजली. अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्यांनी माझे मन जिंकलेच. मला माफ करा आणि माझ्या चुका पदरात घ्या.’’

‘‘एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव.’’

ब्रेकअप

कथा * शकुंतला सोवनी

ब्रेकअप,’’ अमेरिकेतून आलेल्या फोनवर रागिणीचे हे शब्द ऐकताच मदनला कानांत कुणीतरी उकळतं तेल ओतल्याचा भास झाला. अभावितपणे त्याच्या डोळ्यांत अश्रू आले.

‘‘काय झालं रे मुन्नु? डोळ्यांत पाणी का आलं?’’ उमा वहिनीच्या या प्रश्नावर तो पार उन्मळून पडला. ‘‘सगळं, सगळं संपलंय गं वहिनी…पाच वर्षं माझ्यावर प्रेम केल्यावर रागिणीनं आयुष्याचा जोडीदार म्हणून दुसऱ्यालाच निवडलंय.’’ त्याला रडू अनावर झालं.

‘‘मुन्नु, खरं सांगू का? तू तिला विसर. खरं सांगते, ती तुझ्यासाठी योग्य मुलगी नव्हतीच,’’ उमावहिनीनं म्हटलं.

उमावहिनी मदनची एकुलती एक वहिनी. वयानं त्याच्याहून जवळजवळ १२ वर्षं मोठी. मदनला ती प्रेमानं मुन्नु म्हणते. मदन महाराष्ट्रातला. मुंबईतल्या एका उपनगरात त्याचे वडील सरकारी नोकरीत होते. स्वत:चं छोटसं घर होतं. आई साधीशी, व्यवस्थित घर सांभाळणारी गृहिणी होती. मदनचा मोठा भाऊ त्याच्याहून जवळजवळ १५ वर्षं मोठा होता. मदनचा भाऊ आईवडिलांना घेऊन एक दिवस व्हीटी स्टेशनला गेला होता. २६ नोव्हेंबरचा दिवस. त्याच दिवशी झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात ती तिघं मृत्यूमुखी पडली होती. मदन तेव्हा ११वीत होता. हुशार मदनला इंजिनियर व्हायचं होतं. पण एका झटक्यात घरातील तीन माणसं गेल्यानं तो अगदीच पोरका झाला होता.

आता घरात फक्त उमावहिनी अन् तिचा लहानसा मुलगा एवढीच माणसं होती. मात्र उमावहिनी आपल्या मुलाएवढंच मदनवरही प्रेम करत होती. तिनं जणू त्याच्या आईची जागा घेतली होती. उमाला राज्य सरकारनं नोकरी दिली, शिवाय तीन माणसांच्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम मिळाली. तिनं मदनच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्याला इंजिनियर करायचा उमानं चंग बांधला होता.

मेरिट बेसिसवर मदनला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश घेता आला. इथं बिहारमधून डोनेशन देऊन प्रवेश मिळवलेले अनेक विद्यार्थी होते. रागिणी त्यापैकीच एक होती. मदनच्याच बॅचला होती. अभ्यासात यथातथाच होती. म्हणूनच वडिलांनी एवढं मोठं डोनेशन देऊन तिचं एडमिशन करून घेतलं होतं. वडिल केंद्र सरकारच्या नोकरीत होते. पगाराव्यतिरिक्त भरपूर पैसा हातात येत होता. वडिल तिलाही चिकार पैसे पाठवायचे. तिचं स्वत:चं एटीएम कार्ड होतं. ती भरपूर पैसे खर्च करायची. मित्रांना हॉटेलात जेवू घालायची. कधी पिक्चरला न्यायची. त्यामुळे तिच्याभोवती पिंगा घालणारे चमचे भरपूर होते. सेकंड इयर संपल्यावर तिची मदनशी मैत्री झाली. मदन मुळात हुशार होता. आपला अभ्यास पूर्ण करून तो रागिणीलाही अभ्यासात मदत करत होता. त्याच्या हुशारीमुळे अन् सज्जन स्वभावामुळे रागिणीला तो आवडायचा. शिवाय तो तिला निरक्षपणे मदत करत होता. त्यामुळे हळूहळू ती त्याच्याकडे आकर्षित झाली. थर्ड इयर संपता संपता दोघांची मैत्री वाढली.

पुढे शनिवार, रविवार दोघं कधी कॉफीहाउसमध्ये तर कधी हॉटेलात लंचला भेटू लागली. अर्थात पुढाकार रागिणीचा असायचा. कारण भरपूर पैसे तीच खर्च करू शकत होती. दोघांनी अमेरिकेतून एमएस करायचं ठरवलं होतं. त्यासाठी जरूरी असलेल्या परीक्षांचीही त्यांची तयारी सुरू होती. मदन त्याच्या उमावहिनीपासून कोणतीही गोष्ट लपवत नसे. त्यानं रागिणीबद्दल वहिनीला सांगितलं होतं. स्कॉलरशिप मिळाली तर फारच छान होईल असं दोघांना वाटत होतं.

अमेरिकेतल्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च होता. रागिणीसाठी ते सहज शक्य होतं. कारण वडील करोडपती होते. प्रश्न मदनचा होता. स्कॉलरशिप त्यालाही मिळाली नाही.

स्टुंडट व्हिसा एफ१ साठी अभ्यास व राहाणं, जेवणखाणं एवढा खर्च करण्याची ऐपत असावी लागते. त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये तेवढा पैसा दाखवावा लागतो. रागिणीच्या अकांउटला तिच्या वडिलांनी तेवढा पैसा भरला होता. मदनला मात्र फारच काळजी लागली होती.

उमावहिनीचं त्याच्याकडे लक्ष होतं. तिनं त्याला दिलासा दिला, ‘‘मुन्नु, तू जायची तयारी कर. मी आहे ना? तुझं स्वप्नं नक्की पूर्ण होईल.’’ उमानं गावाकडची काही शेतजमीन विकून, काही दागिने गहाण ठेवून अन् काही शिल्लक पैसा काढून त्याच्या अकाउंटला पैसे भरले. रागिणी अन् मदन दोघांनाही व्हिसा मिळाला. दोघांच्या एडमिशन्स मात्र वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत झाल्या. पण दोघंही अमेरिकेला पोहोचले एकदाचे.

दोघांच्या कॉलेजमध्ये केवळ एक तासाचं कार ड्राइव्हचं अंतर होतं. रागिणीला कॅलिफोर्नियातल्या सांता क्लारा युर्निव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती तर मदनला जागतिक कीर्तीच्या वर्कले युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. श्रीमंत बापाची पोरगी रागिणीला वडिलांनी तिथं कारही उपलब्ध करून दिली. दोघं वीकेंडला भेटायची. भेटणं, एकत्र राहाणं, जेवणखाणं, अभ्यासाची चर्चा सगळंच त्यामुळे शक्य व्हायचं. बहुतेक वेळा रागिणीच कारनं मदनकडे यायची. क्वचित कधी मदन बसनं तिच्याकडे जायचा. तीच त्याला कारनं माघारी आणून सोडायची. एकमेकांच्या वाढदिवसाला, व्हॅलेंटाइन डेला दोघं एकमेकांना गिफ्ट द्यायची. अर्थात्च रागिणीच्या भेटवस्तू महागड्या असायच्या.

उमावहिनीला मदन सगळं सांगत होता. तिच्या फक्त एवढंच मनांत आलं होतं की इतक्या श्रीमंतीत वाढलेली मुलगी आपल्या निम्न मध्यमवर्गीय घरात रूळेल का? पण उघड ती काहीच बोलली नव्हती. तिची पूर्ण संमती होती. फक्त चुकीचं पाऊल उचलू नकोस अन् कुणा मुलीचा विश्वासघात करू नकोस एवढं तिनं मदनला बजावलं होतं.

रागिणीनंही घरी आईवडिलांना आपलं प्रेमप्रकरण सांगितलं होतं. त्यांचा मदनच्या मराठी असण्यावर आक्षेप नव्हता. पण त्याची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच खटकत होती. मदनपेक्षा चांगल्या, श्रीमंत मुलाशी लग्न करण्याबद्दल त्यांनी रागिणीला सुचवलंही होतं. पण रागिणीनं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मदन रागिणीचं प्रेम अबाधित होतं. लग्न करून आयुष्य एकत्र घालवण्याच्या आणाभाका घेऊन झाल्या होत्या.

दोन वर्षांत मास्टर डिग्री घेऊन मदन भारतात परतला होता. येताना रागिणीही त्याच्यासोबत मुंबईला आली होती.

दोन दिवस ती त्याच्या घरीच राहिली. उमावहिनीनं विचारलं, ‘‘आता तुमचा दोघांचा काय बेत आहे?’’

रागिणी म्हणाली, ‘‘वहिनी, मास्टर्स केल्यावर एक वर्ष आम्हा दोघांना पी.टी म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण करावं लागेल. यात आम्ही कुठल्याही कंपनीत एक वर्षं काम करतो. आम्हाला दोघांना नोकरीही मिळाली आहे. या वर्षभराच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगनंतर आम्ही लग्न करणार आहोत. मदननं तुम्हाला सांगितलंच असेल ना?’’

‘‘होय, मदननं सांगितलंय, पण मला असं विचारायचं आहे की लग्नानंतर तुम्ही, म्हणजे तू नोकरी अमेरिकेत करणार की भारतात?’’ उमानं विचारलं.

रागिणी म्हणाली, ‘‘ते सगळं मी मदनवर सोपवलंय. त्याला योग्य वाटेल ते तो करेल. वहिनी, तुम्ही अगदी निश्चिंत असा.’’

दोन दिवस मुंबईत राहून रागिणी बिहारला आपल्या घरी गेली.

रागिणीच्या बोलण्यानं उमालाही दिलासा मिळाला. घरी गेल्यावर रागिणीचे वडिल म्हणाले, ‘‘हे बघ मुली, तुझ्या आनंदातच आमचाही आनंद आहे. पण तू विचारपूर्वक निर्णय घे. मदन मुलगा चांगलाच आहे…तरीही त्याच्या कुटुंबात तू व्यवस्थित ऍडजस्ट होशील याची तुला खात्री आहे का?’’

रागिणी म्हणाली, ‘‘मदनच्या कुटुंबात सध्या तरी मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाहीए.’’

‘‘तरीही मला एकदा त्याला भेटायचं आहे.’’ वडिल म्हणाले.

‘‘ठीक आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा त्याला बोलावून घेईन.’’

‘‘नको, आत्ता नको, मी स्वत:च जाऊन भेटेन त्याला.’’ वडिलांनी सांगितलं.

सुमारे दोन आठवड्यांनी मदन व रागिणी अमेरिकेला परत आले अन् त्यांची नोकरी सुरू झाली. पण आता दोघांची नोकरी दोन टोकांना होती. एक ईस्ट कोस्टला तर दुसरा वेस्ट कोस्टला. विमान प्रवासातच सहा-सात तास लागणार. आता भेटी फारच क्वचित व्हायच्या. इंटरनेटवर, स्काईपवर भेट व्हायची तेवढीच.

रागिणीच्या कंपनीत कुंदन नावाचा एक नवा भारतीय मुलगा आला. त्याचे वडिल मुंबईतले प्रसिद्ध ज्वेलर होते. तो दोन बेडरूमच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहात होता. स्वत:ची एसयूव्ही होती. रागिणीचीही छोटी गाडी होती. रागिणी त्याच्या श्रीमंत राहणीमुळे भारावली होती. एका वीकेंडला कुंदननं रागिणीला गाडीतून ऑरलॅन्डोला नेलं. तिथं एका हॉटेलात दोघं थांबली होती. नंतरच्या पंधरवड्यात कुंदननं तिला डिस्ने लॅन्डला फिरवून आणलं. मदनशी हल्ली रागिणीचा संपर्क कमी द्ब्रा झाला होता. तिनं कुंदनबद्दल मदनला सांगितलं होतं. पण त्याच्याशी     इतकी जवळीक झाली आहे हे मदनला ठाऊक नव्हतं.

मदन कॅलिफोर्नियामध्ये एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहात होता.  स्वत:च स्वयंपाक करून जेवत होता. एक छोटी टूसीटर कार होती. एक दिवस अवचित रागिणीचा फोन आला. ती वडिलांना घेऊन शनिवारी त्याला भेटायला येतेय. रविवारी राहून सोमवारच्या फ्लाइटनं परत जाईल.

गडबडीनं मदननं तीन दिवसांसाठी भाड्यानं एक कार घेतली. त्यांच्या वास्तव्यासाठी बाहेर गेलेल्या मित्राच्या फ्लॅलटची किल्ली मागून घेतली. शनिवारी एयरपोर्टवरून त्यांना तो घेऊन आला. त्यादिवशी मदननं केलेला स्वयंपाकच सगळे जेवले. नंतर मात्र हॉटेलातच जेवायला पसंती दिली. हॉटलचं बिल मदनलाच द्यायचं होतं.

रागिणीच्या वडिलांनी मदनला त्याचा पुढचा कार्यक्रम विचारला, ‘‘अंकल, मला हे वर्ष पूर्ण झाल्यावर भारतात परत जावं लागेल, वहिनीला माझी गरज आहे. शिवाय इथली माझी कंपनी त्यांच्या भारतातल्या मुंबई ऑफिसात मला पोस्ट करायला तयार आहे.’’
रागिणीचे बाबा फक्त ‘‘हूं,’’ म्हणाले. रागिणी वडिलांबरोबर परत गेली.

आता तिचे वीकेंड कुंदनबरोबरच जायचे. मदनसोबत व्हिडिओचॅटिंगही बंद झालं होतं. आठवड्यात कधी तरी चॅट करायची तेवढंच. याच अवधीत रागिणीचा वाढदिवस आला.

मदननं एक लेडीज पर्स तिला भेट म्हणून दिली. तर कुंदन सोन्याचे सुंदर इयररिंग्ज घेऊन आला. न्यू जर्सीत त्याचे नातलग होते. त्यांच्या दुकानातून त्यानं ते घेतले, रागिणीचे वडील अजून तिथेच होते. त्यांनी कुंदनबद्दल विचारलं, तेव्हा तिला जे काही त्याच्याबद्दल ठाऊक होतं ते तिनं सांगितलं.

योगायोग असा की त्याच शनिवारी कुंदन स्वत:ची गाडी घेऊन तिथं पोहोचला. रागिणीनं त्याची वडिलांशी ओळख करून दिली. तो उत्साहाने म्हणाला, ‘‘अंकल, आपण फ्लोरिडाला जाऊया का? उद्या तिथून रॉकेट लाँच होतंयं. आपण रॉकेट लाँचिंग बघू अन् तिथं मजेत राहू.’’

तिघं फ्लोरिडाला निघाले. कुंदन गाडी चावलत होता. वडील त्याच्या शेजारी बसले होते. बोलता बोलता त्यांनी कुंदनला त्याच्या पुढच्या प्लॅन्सबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘‘मी तर इथंच सेटल व्हायचं ठरवलंय. माझी नोकरी आहेच. अजून एक चांगली ऑफर आलीए. अन् मला इथं ज्वेलरीचा बिझनेसही सुरू करायचा आहे.’’

कुंदननं एका फोर स्टॉर हॉटेलात रूम बुक केली होती. तिघंही एकाच खोलीत होती. रॉकेट लाँचिंग बघून, फ्लोरिडा फिरून मंडळी परत आली. जोवर बाबा होते, मदन रोज हॉटेलमधून जेवण पॅक करून घरी आणायचा.

एकदा बाबा म्हणाले, ‘‘मला तर कुंदन अधिक योग्य मुलगा वाटतोय. तुझं काय मत आहे?’’

ती म्हणाली, ‘‘तो चांगला आहे, पण सध्या तरी आम्ही फक्त मित्र आहोत. त्याच्या मनांत काय आहे ते मला कळलेलं नाही.’’

वडील म्हणाले, ‘‘थोडा पुढाकार घेऊन तूच त्याचं मन जाणून घे. इतकी काळजी घेतोय तुझा, इतका खर्च करतो, त्याच्या मनांत लग्न करण्याचा विचार असेलच! असं बघ रागिणी, तुम्हा दोघी बहिणींवर मी इतका खर्च करतोय, तो एवढ्यासाठीच की तुम्हाला काही कमी पडायला नको. मदन मुळात गरीब, त्यातून तो वहिनी व तिच्या मुलासाठी भारतातच रहायचं म्हणतोय…’’

रागिणी त्यावेळी काहीच बोलली नाही.

बाबा परत जायला निघाले तेव्हा कुंदनने त्यांना विमानतळावर पोहोचवलं, शिवाय त्यांच्यासाठी व रागिणीच्या आईसाठी भेटवस्तूही दिली.

मदनशी आता रागिणीचा संपर्क नव्हता. कधीतरी फोन, कधीतरी चॅटिंग…वडील निघून गेल्यावर रागिणीला कळेना, मदन अन् कुंदनमधून नवरा म्हणून कुणाची निवड करावी? बाबा तर सतत कुंदनचीच वाहवाही करत होते. कुंदनशी तिची मैत्री वाढत होती तर मदनशी दुरावा वाढत होता.

त्याचवेळी एक दिवस कुंदननं तिला प्रपोज केलं. ‘‘रागिणी, तू माझ्याशी लग्न करशील? नीट विचार करून उत्तर दे, कारण मी अमेरिकेतच स्थायिक होणार आहे.’’

रागिणीला अमेरिका अन् इथली जीवनशैली आवडत होती. तरीही तिनं कुंदनकडून थोडावेळ मागून घेतला.

भारतात उमावहिनीला हार्ट अॅटक आला होता. तिला चारपाच दिवस इस्पितळात रहावं लागलं होतं. पण तिच्या भाऊ, भावजयीनं सगळं व्यवस्थित सांभाळलं.

मदनला फोन आला. उमा स्वत:च फोनवर बोलली, ‘‘आता मी बरी आहे मुन्नु, माझी काळजी करू नकोस. इथं माझे दादा वहिनी माझी काळजी घेताहेत.’’

त्यानंतर महिन्याभरातच मदन भारतात परतला. मुंबईतच त्याला पोस्टिंग मिळालं होतं. येण्यापूर्वी तो रागिणीला भेटला. तिच्याशी सविस्तर बोलला, ‘‘मी तर आता भारतात परत जातोय. मी तिथंच राहाणार आहे. तुझं पी.टी.ही आता संपतंय, तेव्हा तू भारतात कधी परत येणार? की अजून काही दिवस इथंच नोकरी करायचा विचार आहे?’’

रागिणीला नेमकं काय करावं ते कळत नव्हतं. मनाची दोलायमान अवस्था होती. ती म्हणाली, ‘‘अजून लगेचच मी इंडियात येत नाहीए. कारण मला एच वर्क व्हिसा मिळालेला आहे. अजून काही दिवस मी इथं नोकरी करून बघणार आहे. मला नोकरी मिळते आहे. मी तुला कुंदनबद्दल बोललो होते ना? त्यालाही वर्क व्हिसा मिळाला आहे. तोही सध्या इथंच राहातोय.’’

मदन भारतातल्या नोकरीवर रूजु झाला. उमा वहिनीला सध्या विश्रांती हवी होती. तिचा मुलगा अन् मुन्नु दोघं मिळून तिची काळजी घेत होते. घरकाम, स्वयंपाक करायला छान बाई मिळाली होती.

रागिणीचे आईवडिल तिला कुंदनशीच लग्न करण्यासाठी आग्रह करत होते. रागिणीलाही त्याच्याविषयी ओढ वाटत होती. कुंदननं तर अमेरिकेत एक मोठंसं घरही लीजवर घेतलं होतं.

सहा आठ महिने गेले. मदनने रागिणीला फोन केला. ‘‘रागिणी, तू भारतात येण्याबद्दल काय ठरवलं आहेस? तू इथं आल्यावर आपण लग्न करूयात. निर्णय लवकर घे. मी भारतातच राहाणार आहे.’’

रागिणी म्हणाली, ‘‘मी भारतात येणार नाही. तू जर अमेरिकेला येत असलास तरच लग्नाबद्दल विचार करता येईल. आता निर्णय तू घ्यायचा आहेस…’’

मदननं म्हटलं, ‘‘आईसारख्या उमावहिनीला मी सोडू शकत नाही. मी अमेरिकेत येणार नाही. तू सांग, काय म्हणतेस?’’

‘‘तर मग वाद कशाला वाढवायचा?’’ रागिणी पटकन् म्हणाली, ‘‘समज ब्रेअप झाला.’’ तिनं फोन बंद केला.

मदनला धक्का बसला…ती कुंदनच्या प्रेमात पडली आहे. त्याच्या वैभवाला भाळली आहे हे ही त्याच्या लक्षात आलं. त्यानं वहिनीला रडतंच सगळं सांगितलं.

मदननं फोन लावून दिला. उमानं रागिणीला विचारलं, ‘‘तू खरंच मदनशी लग्न करणार नाहीस?’’’

रागिणी म्हणाली, ‘‘मी तिथं येऊ शकत नाही अन् मदन इथं येऊ शकत नाही. तेव्हा मी इथंच माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधलाय. मदनला म्हणावं, तू ही तसंच कर.’’

उमावहिनी मायेनं बोलली, ‘‘रागिणी, अगं मदन इथं रडतोय. पाच वर्षं तुम्ही प्रेमात होता. मैत्रीचं, प्रेमाचं, विश्वासाचं नातं तू असं तडकाफडकी कसं तोडू शकतेस? एकदा पुन्हा विचार कर.’’

रागिणी म्हणाली, ‘‘आता उगीचच वेळ घालवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. मदनला म्हणावं रडणं सोड, नवा जोडीदार शोध.’’

थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. मग उमा म्हणाली, ‘‘मग मी मदनला काय सांगू? तू कुंदन…’’

तिला पुढे बोलू न देता संतापून रागिणी ओरडली.

‘‘ब्रेकअप…ब्रेकअप…ब्रेकअप…फुल अॅण्ड फायनल.’’ फोन कट झाला.

उमा मदनच्या जवळ बसली. प्रेमानं त्याला थोपटत म्हणाली, ‘‘शांत हो. रडू तर अजिबात नकोस. रागिणीला कुंदन हवाय…सोनंनाणं, पैसा अडका, मोठं घर, आधुनिक राहणी अन् सुखासीन आयुष्य…तू दुसरी मुलगी बघ. तुझ्या परिस्थितीशी जुळवून घेईल अशी. खरं सांगते रागिणी कधीच तुझ्यासाठी योग्य जोडीदार नव्हती. तिला जाऊ दे. तिला विसर. नव्यानं आयुष्य सुरु कर.’’

अपंग

कथा *  रवी चांदोरकर

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचं विमान उभं होतं. मुंबईहून दिल्लीला जाणारी फ्लाइट होती. सगळ्या सीट्स भरलेल्याच होत्या. स्वातीनं गौरवबरोबर विमानात प्रवेश केला. गौरव व्हीलचेअरवर होता. एअरहोस्टेस व्हीलचेअर ढकलत होती. स्वाती तिला मदत करत होती. गोरापान, देखणा गौरव त्रासल्यासारखा दिसत होता.

स्वातीनं एअरहोस्टेसच्या मदतीने गौरवला सीटवर नीट बसवलं. एअरहोस्टेसला धन्यवाद दिले अन् हातातलं सामान वरच्या रॅकवर ठेवून ती आपल्या सीटवर बसली. तेवढ्यात विमानात प्रवेश करणाऱ्या जोडीकडे तिचं लक्ष गेलं. तो अनंत होता. त्याच्याबरोबर नवपरिणीत वाटणारी एक सुंदर मुलगी होती. मुख्य म्हणजे अनंत व्यवस्थित चालत होता. दोघंही खूप आनंदात दिसत होती. स्वातीनं आपला चेहरा मॅगिझनच्या आड लपवला. तिला अनंतकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं. ती दोघं स्वातीच्या सीटच्या दोन सीट मागे जाऊन आपल्या आसनावर बसली

स्वातीला घेरी आल्यासारखं वाटलं. तिनं गौरवच्या हातावर हात ठेवला.

‘‘काय झालं स्वाती? बरं वाटत नाहीए का?’’ गौरवनं विचारलं.

स्वातीनं उत्तर दिलं नाही, तेव्हा गौरवनं पुन्हा विचारलं, ‘‘काय होतंय? बरी आहेस ना?’’

‘‘हो…हो, आता बरं वाटतंय. एकदम घेरी आल्यासारखं झालं मघाशी,’’ स्वातीनं स्वत:ला सावरून उत्तर दिलं.

स्वातीचं ग्रॅज्यूएशन होता होताच तिचं अनंतशी लग्न झालं होतं. दिसायला अतिशय सुंदर, अभ्यासात हुशार अन् वागायला अत्यंत गुणी असलेली स्वाती सगळ्यांची लाडकी होती.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पाच बहिणींपैकी स्वाती सर्वात धाकटी. ती बी.ए. फायनलला असतानाच वडील वारले. चार पोरी उजवता उजवता वडिल तरूण वयातच म्हातारे दिसायला लागले होते. इकडून तिकडून कर्ज घेत कशीबशी चार पोरींची लग्नं केली अन् हार्ट अटॅक येऊन स्वातीच्या लग्नाआधीच जग सोडून गेले. निरक्षर, गरीब घरातली मुलगी असलेली स्वातीची आई या धक्क्यानं अंथरूणाला खिळली. चारही बहिणींना काळजी पडली की बाबांपाठोपाठ आईही या जगातून गेली तर स्वातीचं कसं होणार? तिला कोण बघेल? कारण या चौघीही तशा सामान्य कुटुंबातच दिल्या गेल्या होत्या. त्यांनी ठरवलं स्वातीचं लग्न लवकरात लवकर करायचं.

मुलं बघायची मोहीम सुरू झाली. पण वडील वारलेले, भाऊ नाहीच हे ऐकून अनेक स्थळं मुलगी न बघताच नकार द्यायची. कुणाला मुलगी पसंत पडली तरी देण्याघेण्यावरुन बोलणी फिसकटायची.

लग्नात खर्च करायला आईकडे कुठं पैसा होता? बहिणीही गरीबीतच राहात होत्या. त्या तरी उचलून काय मदत करणार होत्या?

स्वाती त्यांची समजूत घालायची, ‘‘तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका, होईल माझं लग्न.’’

एकदा स्वातीसाठी मुंबईतल्या एका फार मोठ्या उद्योगपतींच्या घरातून स्थळ आलं. नात्यातल्या एकानं हे स्थळ सुचवलं होतं.

‘‘मावशी, खूप छान स्थळ आहे. स्वाती राज्य करेल त्या घरात. पैसा अडका, मोटारी, नोकर चाकर आलिशान बंगला…’’ स्वातीचा चेहरा उजळला.

‘‘पण सुशांत, अरे ती एवढी बडी माणसं, आम्ही गरीब…’’

‘‘मावशी, त्यांना फक्त हुशार अन् समजून घेणारी मुलगी हवी आहे. मुलात थोडा दोष आहे.’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘लहानपणी त्याला काही आजार झाला होता. त्यात एक पाय अधू झालाय. पण ती पैसेवाली माणसं आहेत. लवकरच अमेरिकेला जाऊन उपचार करून घेणार आहेत.’’

‘‘पण पाय होईल ना चांगला?’’ आईनं काळजीनं विचारलं.

‘‘होय मावशी. अमेरिकेतल्या निष्णात डॉक्टरशी बोलणी सुरू आहेत त्यांची.’’

‘‘तरीही मला जरा…’’

‘‘मावशी, स्वाती माझी बहीण आहे. अयोग्य व्यक्ती मी माझ्या बहिणीसाठी सुचवेन का? अनंतला बघशील तर तू ही त्याच्या प्रेमात पडशील. दिसायला तो चांगलाच आहे. वर पुन्हा श्रीमंतीचं, बुद्धीचं, शिक्षणांचं तेज…तो चालत नाही तोवर कुणाला त्याचा दोष कळतसुद्धा नाही.’’

शेवटी सुशांतने मावशीचं व तिच्या पाचही मुलींचं मन वळवलं. स्वातीला प्रथम, पायानं अधू असलेला अनंत पसंत नव्हता. पण आपल्या गरीबीचं रडगाणं पुन्हा पुन्हा गाऊन बहिणींनी तिलाही राजी केलं.

लग्न मुंबईतच खूप थाटात झालं. स्वातीची आई, चारही बहिणी, त्यांचे नवरे, मुलं सर्वांना छान आहेर मिळाले. मुंबई हिंडवून आणली. स्वातीच्या घरून त्यांनी एक पैसाही घेतला नाही. सगळेच लोक खुश होते.

स्वातीला तर ते वैभव बघून घेरीच आली. सासूसासरे तिची खूप काळजी घ्यायचे. तिच्यावर खूप माया करायचे.

अनंतचा एक पाय आजारपणांत अधू झाल्यामुळे त्याला कुबडी घ्यावी लागे. प्रथम स्वातीला त्याच्याबरोबर बाहेर पडायची लाज वाटायची. पण मग तिनं स्वत:ला बजावलं, इतकं प्रेम करणारा नवरा भेटलाय, त्याचं आपण आधार व्हायचं. त्याला काही कमी पडू द्यायचं नाही. त्यानंतर तिला अनंतची कधीच लाज वाटली नाही. सगळा देश ती अनंतबरोबर फिरली. मुंबईत होणाऱ्या अनेक कार्यक्रमांत ती अनंतबरोबर जायची. कार्यक्रम एन्जॉय करायची.

एकदा क्लबच्या एका कार्यक्रमानंतर ती अनंतचा हात धरून बाहेर येत असताना स्वातीला अचानक गौरव दिसला. तिच्याबरोबर तो कॉलेजात होता. स्मार्ट अन् देखणा तरूण होता तो.

‘‘हॅलो गौरव,’’ स्वातीनं त्याला हाक मारली.

‘‘हाय स्वाती, कशी आहेस? कुठं असतेस हल्ली?’’ गौरवनं तिच्या जवळ येत विचारलं.

‘‘इथंच असते मुंबईत. लग्न झालं माझं. दोन वर्षं झालीत.’’

‘‘अरेच्चा? दोन वर्षं झालीत?’’ आश्चर्यानं गौरव बघतंच राहिला.

‘‘हे माझे पती अनंत.’’ स्वातीनं ओळख करून दिली.

‘‘नमस्कार, मी गौरव,’’ गौरवनं हात पुढे केला.

‘‘नमस्कार, मी अनंत,’’ त्याच हात हातात घेऊन हस्तांदोलन करत अनंत म्हणाला.

त्याच्या अधू पायाकडे गौरवचं लक्ष गेलं. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं स्वातीकडे बघितलं.

स्वातीनं त्याची खबरबात विचारली तेव्हा तो म्हणाला, हल्लीच तो दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झालाय. एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदावर आहे. अजून लग्न केलं नाहीए. स्वातीनं त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. एकमेकांच्या मोबाईल नंबर्सची देवाण घेवाण झाली अन् ते आपापल्या घरी गेले.

त्या रात्री गौरवला झोप आली नाही. तो कॉलेजच्या दिवसांपासून स्वातीवर प्रेम करत होता, पण त्या वयात प्रेमाचा उच्चार करायला घाबरत होता.

स्वातीने अशा अपंग माणसाशी लग्न का केलं असेल? ती खरोखर सुखात आहे की वरवर आनंदी दिसते? अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते. स्वातीला याबाबतीत एकदा विचारावं असं त्यानं ठरवलं.

त्यानं एक दिवस स्वातीला फोन केला अन् ‘केव्हा भेटूयात’ असं विचारलं. स्वाती म्हणाली, ‘‘उद्या मी मार्केटला जाते आहे तेव्हा तिथंच आपण भेटूयात.’’

मार्केटमधल्या कॉफी शॉपमध्ये दोघं भेटली. स्वातीनं तिच्या लग्ना आधीची अन् मग लग्न ठरल्यानंतर, लग्न झाल्यानंतरची सर्व हकिगत गौरवला सांगितली.

अनंत बरोबर ती आनंदात आहे. सासू सासरे, इतर नातलग तिच्यावर किती माया करतात शिवाय अनंतचा कोट्यवधींचा टर्न ओव्हरचा बिझनेसही ती बघतेय वगैरे अनेक गोष्टी गौरवला सांगितल्या.

स्वातीच्या गरीबीमुळेच तिला ही तडजोड करावी लागली असली तरी ती आता अगदी सुखात आहे हे बघून गौरवला आश्चर्य वाटलं.

त्यादिवशी तिला परतून यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. तिनं ड्रायव्हलाही सोबत नेलं नव्हतं. त्यामुळे अनंतला खूपच काळजी वाटली. अनंत तिला मोबाइलवर फोन लावत होता. पण गाडी ड्राइव्ह करत असल्यामुळे स्वातीनं फोन उचलला नाही.

घरी आल्यावर अनंतची क्षमा मागून स्वाती म्हणाली, ‘‘अनंत, तुमची स्वाती आता मुंबईकर झाली आहे. पूर्वीसारखी घरगुती, घाबरट स्वाती नाहीए ती.’’

गौरवशी स्वातीच्या भेटी वाढल्या. गौरव घरीही येऊन गेला. अनंतनं त्याला मित्रासारखीच वागणूक दिली. गौरव अन् स्वाती एकत्र सिनेमाला, हॉटेललाही जाऊ लागली. त्यांच्यातली जवळीक वाढू लागली. गौरवचं आकर्षण स्वातीला त्याच्याकडे ओढत होतं अन् तिच्याही नकळत ती अनंतपासून दुरावरत होती.

स्वाती अन् अनंतच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. पण अजून त्यांना मूळबाळ नव्हतं. स्वातीला आता गौरवच अधिक जवळचा वाटत होता. त्याच्याबरोबर संसार थाटायची स्वप्नं ती बघत होती.

अनंत पायानं अधू असला तरी हुशार अन् कर्तबगार होता. स्वातीवर त्याचं खूपच प्रेम होतं. तिनं त्याला आपलं म्हटलं, त्याला भारतदर्शन घडवलं याबद्दल तो तिचा कृतज्ञ होता. तो तिला म्हणायचा, ‘‘माझे पाय बरे झाले की मी तुला जगप्रवासाला नेईन, थोडी कळ काढ.’’

पण आता स्वातीमध्ये झालेला बदल त्याला जाणवत होता. स्वातीला तो काही म्हणत नव्हता, पण स्वातीचं ऑफिसमधून बराच वेळ बाहेर असणं, ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष, घरी उशिरा अवेळी येणं, सगळ्यांनाच खटकत होतं.

अनंतच्या आईबाबांनी अत्यंत सौम्यपणे स्वातीला या बाबतीत विचारलं, तेव्हा तिनं आपण ऑफिसच्या कामानं बाहेर जातो किंवा मैत्रिणींकडे भिशी, किटी असते म्हणून जातो असं सांगून वेळ मारून नेली.

अनंतच्या बाबांचा मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्यांनी एका खाजगी गुप्तहेराला स्वातीवर नजर ठेवायला सांगितलं. त्यानं काढलेली माहिती धक्कादायक होती. स्वातीचा सगळा वेळ गौरवच्या सोबतीत जात होता. तिनं एका पंचतारांकित हॉटेलात एक खोलीही बुक करून ठेवली होती. नेहमी ती दोघं तिथंच भेटायची.

दोनचार दिवसातच डिटेक्टिव्हनं सूचना दिली की स्वाती आणि गौरव हॉटेलात आहेत. अनंतचे आईबाबा ताबडतोब तिकडे गेले.

बाबांनी खोलीची बेल वाजवली. गौरवला वाटलं, वेटर असेल म्हणून त्यानं दार उघडलं. दारात त्या दोघांना बघून तो एकदम गांगरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ‘‘तू…तुम्ही?’’ कसा बसा बोलला.

‘‘नालायक, कृतघ्न माणूस…बाजूला हो.’’ बाबांनी त्याला खोलीत ढकललं अन् ते आत आले. खोलीत बेडवर स्वाती झोपलेली होती. संतापलेल्या सासूसासऱ्यांना अवचित असं समोर बघून ती धडपडून उठून बसली.

‘‘स्वाती काय चाललंय हे?’’ सासूनं दरडावून विचारलं. स्वाती खाली मान घालून उभी होती.

‘‘तुझे इतके लाड केले. कार ड्रायव्हिंग शिकवलं, धंद्यात तुला पार्टनर केलं, पैसा भरपूर दिला, स्वातंत्र्य दिलं त्याची अशी शिक्षा देते आहेस आम्हाला?’’ सासरे गरजले.

‘‘होय, हेच सत्य आहे. सगळं आयुष्य मी तुमच्या अपंग मुलाबरोबर नाही काढू शकणार. मला सुदृढ जोडीदार हवाय. कुठवर मी सहन करू?’’ एकाएकी स्वातीनंही रूद्रावतार धारण केला.

‘‘तर मग राहा याच्याच बरोबर. यापुढे आमच्या घरात तुला जागा नाही.’’ सासूनं म्हटलं. सासूसासरे तिथून तडक घरी पोहोचले.

घरी जाऊन त्यांनी अनंतलाही सांगितलं. रात्री स्वाती घरी आली. ‘‘आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही,’’ अनंतनं म्हटलं.

दुसऱ्याच दिवशी अनंतच्या नावांनं एक चिठ्ठी लिहून ठेवून स्वातीनं घर सोडलं.

‘‘गौरवबरोबर जाते आहे. तुम्ही दिलेल्या प्रेम, आदर. पैसा, स्वातंत्र्य व सर्वच गोष्टींसाठी आभारी आहे. माझा शोध घेऊ नका.’’

स्वाती घर सोडून गेल्यावर सासऱ्यांनी पुन्हा व्यवसायात लक्ष घातलं. मधल्या काळात त्यांनी अनेक गोष्टी स्वातीवर सोपवल्या होत्या. जे वास्तव समोर आलं ते धक्कादायक होतं. हॉटेलची लाखो रूपयांची बिलं दिली गेली होती. एक कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम व पन्नास हजारांचे दागिने बँकेतून काढले गेले होते. स्वाती असा विश्वासघात करेल याची त्यांनी स्वप्नांतही कल्पना केली नव्हती. एवढ्या मोठ्या खानदानी कुटुंबातली लाडकी सून असा दगा देऊन प्रियकरासोबत निघून गेली होती.

काळासारखं औषध नाही म्हणतात. हळूहळू अनंत व त्याच्या घरचे लोक सावरले. व्यवसायानं अधिक जोम धरला. बऱ्यांपैकी स्थिरस्थावर होतंय म्हणेपर्यंत एक धक्का अजून बसला. स्वातीनं वकीलांमार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. दहा कोटींची मागणी केली होती. तिच्या लोभीपणाला मर्यादा नव्हती. आधीच एक कोटी कॅश अन् पन्नास हजारांचे दागिने नेले होते. लाखो रूपये हॉटेलवर खर्च केले होते आणि आता हे दहा कोटी, पण शेवटी नावाचा, नामांकित घराण्याच्या इभ्रतीचा प्रश्न होता. अनंतनं व त्याच्या आईबाबांनी निर्णय घेतला की परस्पर संमतीनं घटस्फोट अन् पोटगी म्हणून आठ कोटी रुपये देऊन ही ब्याद आयुष्यातून कायमची घालवावी.

आठ कोटी रुपये घेऊन स्वातीनं अनंतला घटस्फोट दिला. तिनं गौरवशी लग्न केलं.

ती आनंदात होती. भरपूर पैसा होता. चैन चालली होती. हातात फुकटचा पैसा आल्यानं गौरवनंही नोकरी सोडून धंदा सुरू केला होता. पार्ट्या, सट्टा, दारू, यात भसाभस पैसा संपत होता.

त्यातच एक अपघात घडला. गौरव बाइकवरून खाली पडला अन् मागून येणारी बस त्याच्या पायांवरून गेली. पायांचा पार भुगा झाला.

स्वातीला कुणीतरी कळवलं. ती धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गौरवचे काही मित्रही आले होते. डॉक्टरांच्या टीमनं स्वातीला सांगितलं की गुडघ्याखाली त्यांचे पाय कापावेच लागतील. ऐकून स्वाती स्तब्ध झाली.

नोकरी गेलेली. मन:पूत खर्च केल्यानं पैशांची चणचणच निर्माण झालेली. दोन्ही पाय गेल्यामुळे गौरव खूप चिडचिडा झाला होता. त्याला वाटे स्वातीनं सतत त्याच्या जवळ राहावं. त्याला जुने दिवस आठवायचे…जेव्हा तो धडधाकट होता तेव्हा स्वाती अनंतला सोडून त्याला भेटायला यायची. आता तो अपंग होता. अनंतला निदान आधार द्यायला आईवडिल, व्यवसाय, अफाट संपत्ती होती. गौरवकडे तर काहीच नव्हतं. जरा स्वाती इकडे तिकडे गेली की तो घाबरा व्हायचा. ‘‘कुणाकडे गेली होतीस, कशाला गेली होतीस,’’ तो तिच्यावर ओरडायचा.

स्वातीला वाईट वाटायचं. तिच्या केलेल्या चुकांची शिक्षा ती भोगत होती. तिला अनंतची आठवण यायची. पण आता काय उपयोग होता?

गौरवच्या उपचारांवर फार पैसा खर्च झाला होता. आता मुंबईत राहाणं अवघड होतं. दिल्लीला परत जाऊन तिथं काहीतरी व्यवसाय करावा असा निर्णय त्यांनी घेतला. दिल्लीला काही जुने मित्र होते. त्यांनी आधार द्यायची तयारी दाखवली.

दिल्लीला जाण्यासाठी स्वाती व्हीलचेअरवरून गौरवला घेऊन विमानतळावर आली होती. तिचा भूतकाळ तिच्या चुकीनं तिनं उद्ध्वस्त केला होता. जे आता हातात होतं, ते तिला घालवायचं नव्हतं.

‘‘एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही बेल्ट बांधायला विसरलात.’’ एअरहोस्टेसनं स्वातीला म्हटलं.

‘‘थँक्यू,’’ स्वातीनं म्हटलं. तिनं मागे वळून बघितलं. अनंत आपल्या सीटवर शांतपणे बसला होता. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. त्याची बायको त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपी गेली होती.

स्वातीला वाटत होतं आज ती स्वत:च अपंग झाली आहे.

झुला भावनांचा

कथा * अर्चना पाटील

मोक्षदा आणि मानस रोजच्याप्रमाणे बाईकवरून खाली उतरले. मोक्षदाने कौस्तुभला आवाज दिला.

‘‘चल रे कॅन्टीनला…मजा करू’’

‘‘तुम्ही व्हा पुढे, आलो मी.’’

थोडयाच वेळात दोघेही कॅन्टीनला पोहोचले. मोक्षदाने तिघांसाठी ऑर्डर दिली. कौस्तुभही येऊन बसला.

‘‘काय धावपळ चालू आहे तुझी इतकी.’’

‘‘काही नाही, आपल्या कॉलेजची एकांकिका आहे. मला नायकाची प्रमुख भुमिका करायची आहे त्यात. म्हणून सकाळी लवकर आलो होतो जरा. कुलकर्णी सरांना मस्का लावत होतो.’’

‘‘अरे काय, एकांकिका…मॅच खेळायला चल, त्यापेक्षा कॉलेजच्या टीमकडून.’’

‘‘तुला काय करायचं आहे? कौस्तुभ तुला अभिनयाची आवड आहे, तू तेच कर.’’ मोक्षदा जरा जोर देऊनच बोलली.

तिघांनी बटाटे वडे आणि चहा घेतला. लेक्चर केले. चार वाजताच कौस्तुभला गावाहून फोन आला. आईची तब्येत बरी नसल्याने तो ताबडतोब गावाकडे गेला. चार पाच दिवस झाले. कौस्तुभचा फोनही लागत नव्हता. नाटकाची तारीख जवळ येत होती.

‘‘कोणी नाटकातली नायकाची भूमिका करायला तयार आहे का?’’ कुलकर्णी सर वर्गात विचारत होते.

वर्गातल्या अजिंक्यने मानसचे नाव सुचवले.

‘‘मानसला घ्या सर, भारी नकला करतो तो सगळयांच्या.’’

‘‘बरं, मानस आजपासून तालमीला हजर रहायचं.’’

‘‘हो सर,’’ मानसही सहजच बोलून गेला.

‘‘तू का हो म्हटलं? ती भूमिका कौस्तुभला करायची होती ना. हे चुकीचे आहे.’’

‘‘अरे, नाटक पंधरा दिवसात सादर करायचे आहे. तो कधी परत येईल हे कोणाला माहिती नाही. मी जर नाही म्हटलो असतो तर दुसरा कोणीतरी नक्कीच उभा राहीला असता? तू पण ना कुठेही वाद घालतेस?’’

त्याच दिवशी रात्री मानस तालमीला गेला. कुलकर्णी सरांना त्याचा अभिनय खुपच आवडला. मोक्षदाही मानससोबतच होती. मोक्षदालाही मानसचे हे रूप खुपच आवडले. रात्रीचे साडेआठ वाजल्याने मोक्षदाचे हॉस्टेलचे गेट बंद झाले होते. तालीम संपल्यावर दोघेही मानसच्या फ्लॅटवर आले.

‘‘भीती नाही वाटत, माझ्यासोबत एकटं फिरण्याची.’’

‘‘नाही, अं…तुझ्यासोबत असलं की खूप आनंद होतो मला.’’

‘‘बसं इतकंच, अजून काहीच नाही. अशी रेडीओसारखी अटकत अटकत नको बोलत जाऊस. स्पष्ट बोलत जा. मी कसं स्पष्ट सांगतो की तू मला आवडते आणि माझं तु?यावर खूप प्रेम आहे.’’

मोक्षदा काहीही न बोलता गालातल्या गालात हसतच राहीली. ‘दो दिल मिल रहें है…’ मंद आवाजात मोबाईलवर गाणे चालू होते. मोक्षदा मानस लावत असलेल्या रोमँटिक गाण्यांचा आनंद घेत होती. रात्रभर छान गप्पा झाल्या. पहाटे पहाटे दोघांचा डोळा लागला. सकाळी दहाला दोघेही नेहमीप्रमाणे बाईकवर कॉलेजला गेले. मानस बाईकवरून खाली उतरताच कौस्तुभ त्याच्यासमोर येऊन उभा राहीला.

‘‘नाटकातली नायकाची भूमिका तुला मिळाली, असं ऐकलं.’’

‘‘हो, खुपच छान वाटतंय यार.’’

‘‘अभिनंदन तुझं.’’ कौस्तुभ थोडं रागानेच बोलून कॅन्टीनमध्ये निघून गेला.

आज कौस्तुभ दुसऱ्याच एका मित्रासोबत एका टेबलवर बसला होता. त्या टेबलवर दोन कप गरमागरम कॉफीचे आले. कौस्तुभ कप उचलणारच तेवढयात मानसने तो कप उचलून मोक्षदाला दिला. पुढच्याच क्षणी कौस्तुभ बिल भरून कॅन्टीनमधून निघून गेला.

‘‘काय तू मानस, मला असा चिल्लरपणा मुळीच पटत नाही. आपण आपल्या पैशाने कॉफी पिऊ शकत नाही का?’’

‘‘चुप गं, माणसाने थोडं रांगडं असावं. इतकंपण साधंभोळं असू नये. वाईट वाटत आहे त्याला नालायकाला. नाटक मिळालं नाही म्हणून. सगळं समजतंय मला. बघू किती दिवस दूर राहतो?’’

संध्याकाळी चार वाजता कौस्तुभ मोक्षदाला लायब्ररीत सापडला. मोक्षदाने हटकूनच मानसचा विषय काढला.

‘‘मानसने काही मुद्दाम नाटक हिसकावले नाही आहे तुझ्यापासून. का बरं एवढा राग करत आहेस त्याचा?’’

‘‘हे बघ मोक्षा, तो जर खरंच माझा मित्र असेल तर त्याने स्वत:हून नाटक सोडले पाहिजे ही माझी माफक अपेक्षा आहे. यापेक्षा जास्त मला बोलायचे नाही.’’

मोक्षदाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मानस आणि कौस्तुभ पुन्हा एकत्र होण्यास तयार नव्हते. मानसला नाटकात उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले आणि कॉलेजकडून त्याचा सत्कारही करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे कौस्तुभ खूपच चिडला होता आणि या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याने मोक्षदाचा वापर सुरू केला. मानस आणि मोक्षदा सोबत असताना कौस्तुभ मुद्दाम मोक्षदाशी बोलू लागला. तिच्याकडून नोट्स मागणे, तिला बळजबरी कॉफी पाजणे, सतत तिची विचारपूस करणे, कोणत्याही कारणाने फोन करणे असे प्रकार सुरू झाले. मानस कॉलेजची मॅच खेळायला दोन दिवस मुंबईला गेला होता. त्याची बस इथून येणार त्याचवेळी कौस्तुभ हटकूनच मोक्षदाला लेडीज होस्टेलला सोडायला घेऊन गेला. साहजिकच मानसने दोघांना सोबत बाईकवर पाहिले आणि त्याचा संताप अनावर झाला. मानस बसमधून उतरताच लेडीज होस्टेलला गेला. मानसला तिथे पाहताच मोक्षदा एक्सायटेड झाली.

‘‘वॉव, तू मला भेटायला लगेच आलास! कशी झाली तुझी मॅच?’’

‘‘लोकं बदलतात पण मी बदलत नाही, मोक्षा मी तुला शेवटचं सांगतोय कौस्तुभचं सतत तुझ्या अवतीभवती असणं मला मुळीच आवडत नाही. तो केवळ मला हरवण्यासाठी तुझा वापर करतो आहे. आतापर्यंत त्याने कधीच तुझ्याशी संबंध ठेवले नाही तर आताच तो तुझ्याशी एवढी जवळीक का करतो आहे? तुला जर त्याच्याशी संबंध संपवायचे नाहीत तर माझ्यासमोरही यायचं नाही. उडत्या पाखराचे पंख मोजणारा माणूस आहे मी.’’ मानस ताडताड बोलून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी पुर्ण दिवस मोक्षदा मानसची वाट पाहत होती. पण मानस कॉलेजला आलाच नाही. मोक्षदाचे उतरलेले तोंड पाहून कौस्तुभ वारंवार विचारपूस करत होता. पण मोक्षदा त्याला सहजच हाकलून लावत होती. शेवटी न राहवून मोक्षदा रात्री होस्टेलला परत न जाता मानसच्या फ्लॅटवर जाऊन बसली.

मानसने दरवाजा उघडून तिला आत तर घेतले पण तो अबोला सोडण्यास तयार नव्हता. आज मोक्षदाने ‘ओजी हमसे रुठकर कहाँ जाईएगा…जहाँ जाईएगा…’ हे गाणं खोलीतील शांतता भरण्यासाठी मंद आवाजात लावले होतं. नंतर दोघांसाठी कॉफी बनवली आणि कप घेऊन त्याच्यासमोर आली.

‘‘राग आला आहे एका माणसाला’’

तरीही मानस शांतच होता. कॉफीचा कपपण त्याने खाली ठेऊन दिला होता.

‘‘बरं, मी लग्न न करता रात्रभर इथे तुझ्यासोबत राहते त्याचं तुला काही नाही. एखाद्या मुलीच्या मागेपुढे कितीही मुलं फिरली तरी जो एक तिला भावतो, ती केवळ त्याचीच होते हे तुम्हा मुलांना कधी समझणार? तू जर खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर सन्मानाने मला लग्न करून तुझ्या घरी घेऊन जा आणि विषय संपव. काय संबंध आहे रे त्याचा नि माझा? मग तू ओळखलस काय मला? फार पुर्वीपासून स्त्री ही एक वस्तू समजली जाते आणि तू पण तेच केलं. जिंकलं मला. खुस! नाही बोलणार मी आजपासून कौस्तुभशी.’’

‘‘तसं नाही आहे. माफ कर मला. मला तुझ्या स्वातंत्र्यावर गदा आणायची नाही आहे. मी जरा जास्तच बोलून गेलो. मी जर तुझ्यावर प्रेम करतो तर तुझ्यावर स्वत:पेक्षा जास्त विश्वासपण ठेवायला हवा. मी लवकरच तुला सन्मानाने माझ्या घरीपण घेऊन जाईन. तुझ्या वडिलांच्या अंगणातले फूल मी माझ्या संसाराची बाग फुलवायला घेऊन जाणार आहे आणि तुझ्या वडिलांनी तुला आतापर्यंत जसं सांभाळले आहे तसंच मीही तुला आयुष्यभर सांभाळणार आहे. आता मी कॉफी बनवतो माझ्या राणीसाठी.’’

दोघांनी पुन्हा कॉफी घेऊन गैरसमजांची होळी केली आणि प्रेमाच्या सरींनी नवी सुरुवात केली.

वेडींग मटेरीयल

कथा * अर्चना पाटील

मंजिरी आणि मानस यांच्या लग्नाला एक आठवडा झाला. पण मानस काही हनिमुनचं नाव घेत नव्हता. शेवटी मंजिरीनेच एका रात्री विषय काढला.

‘‘काहो, माझी रजाही संपली आता. आपण कुठेच फिरायला गेलो नाही. माझ्या मैत्रिणी शिमला, कुलु…फार नाही तर महाबळेश्वरला तरी जातात.’’

‘‘जाऊ ना नंतर ..आईबाबा काय म्हणतील…अजून अख्खं आयुष्य पडलं. झोप आता.’’

‘‘काय बोरींग आहे हा! आईबाबांसाठी हनिमूनला जायला घाबरतोय हा…’’

मनातल्या मनात नवऱ्याला दोन तीन शिव्या देऊन मंजिरी झोपली. दुसऱ्या दिवसापासून मंजिरी आणि मानस दोघेही ऑफिसला जायला लागले. संध्याकाळी मंजिरी सहालाच घरी आली. स्वयंपाक वगैरे आटोपून ती बसली होती. तेवढयात मंजिरीचा दिर वेद कामावरून आला.

‘‘काय मग वहिनी, चलता का आइस्क्रिम खायला? पैसे मीच देईन चिंता करु नका.’’

‘‘अरे व्वा, नक्कीच येणार मी.’’

मंजिरी आणि वेदची चांगलीच मैत्री जमली. आठवडयातून तीन चार वेळा तरी ते एकमेकांसोबत घराबाहेर कोणत्या तरी बहाण्याने जात होते. कधी किराणा आणायला, कधी नातेवाईकांना भेटायला. मानस आणि मंजिरी फक्त रात्रीच बेडवर थोडेफार बोलत होते आणि दिवस जात होते. मानस दिवसांतून एकही फोन मंजिरीला करत नसे. याउलट वेद दिवसातून वेळ काढून एक फोनतरी न चुकता आठवणीने करत असे. एक दिवस मंजिरीने आपल्या वैवाहिक गोष्टी वेदला सांगायला सुरुवात केली.

‘‘वेद, मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय रे. तुझा भाऊ घाबरतो आईबाबांना. त्याला लाज वाटते बायकोसोबत फिरण्याची. आज लग्नाला सहा महिने होऊन गेले तरी कुठे जायचा विषयही काढत नाही. माझं मेलीचं नशीबच फुटकं. बापपण तसाच आणि नवरापण तसाच भेटला. आम्हीही चार बहीणी त्यामुळे माहेरीपण बापाने कधीच कुठे फिरायला नेले नाही की हौस पूर्ण केली नाही…’’ बोलता बोलता मंजिरी रडायलाच लागली.

‘‘जाऊ दे गं वहिनी, मी नेतो तुला फिरायला. सांग कुठे जायचं आहे?’’

‘‘कुलु, शिमला, मनाली…’’

‘‘बस्स इतकंच ना, मी नेतो तुला. तू फक्त घरातल्यांना सांभाळ.’’

‘‘तू तिकीट बुक कर. मी सांगते, मी माहेरी जाते आहे आणि माहेरी सांगेन की मैत्रीणींसोबत फिरायला जाते आहे, कारण माझा नवरा मला सोबत कुठे नेत नाही आहे.’’

‘‘वेलडन, करतो मी तिकीट बुक.’’

इतक्या दूर प्रवासाला गेल्यावर वेद आणि मंजिरीला एकांत मिळाला आणि दोघांनीही आपली मर्यादा ओलांडून चुकापण केल्या. पण घरी आल्यावर दोघांमधेही अपराधीपणाची जाणीव नव्हती. उलट मंजिरी आपली फिरण्याची हौस पूर्ण करून घेण्यासाठी वेदच्या पूर्णपणे आहारी गेली. हळूहळू त्यांच्यातली जवळीक सासुबाईंना घरात जाणवू लागली. सासुबाईंनी ताबडतोब मंजिरी आणि मानसला दुसरा फ्लँट घेऊन दिला. पण यामुळे उलट मंजिरीवर कोणाचे बंधनच राहीले नाही. ती आता शहरातही वेदसोबत फिरू लागली.

‘‘सध्या काय खुष दिसते आहे माझी राणी.’’ मानवने विचारलं.

‘‘कुछ लोग गुलजार की गजलोंकी तरह होते है, हर हालमें अच्छेही लगते है…मेरी जान. आप नहीं समझेंगे…सिनेमाला गेले होते मी आज. खुपच सुंदर सिनेमा होता. अहो…कीचनमधे फॅन बसवा ना. एक लाख पगार घेतो आपण दोघे मिळून.’’

‘‘चालू झाले का तुझे…हो सांगितले आहे ना मी तुला…मी तुला नाही म्हणतोय का…’’

‘‘नेहमीसारखं तेच गुळचट उत्तर…नवीन फ्लॅटमधे येऊन तीन महिने झाले, पण हॉलमध्ये एका बेडशिवाय दुसरं काही नाही. दोन पाहुणे आले की लगेच शेजाऱ्यांकडून खुर्च्या मागाव्या लागतात. कंटाळा आला आहे मला या माणसाचा. वेद असता तर पहिले त्याने हॉल सजवला असता, सगळया मित्रांना एक पार्टी दिली असती. वेदची प्रत्येक गोष्टच निराळी.’’ मंजिरी मनातल्या मनात कुढत होती.

मानस संध्याकाळी सहाला घरी येत असे. चहा घेतला की अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये गप्पा मारत बसत असे. मंजिरीने जेवायला बोलवलं की तू जेऊन घे हे उत्तर ठरलेले असे. दोन-तीन आठवडयातच मंजिरीचे जेवण्यासाठी फोन करणे बंद झाले कारण त्याची गप्पांची मैफील त्याला मंजिरीपेक्षा जास्त महत्त्वाची असे. रात्री अर्धा-एक तास बायकोसोबत फॉरमॅलिटी पूर्ण करणे म्हणजे लग्न का? असा प्रश्न आता मंजिरीला पडायला लागला. लग्नाला एक वर्ष झाले. पण मंजिरीसाठी मानससोबत राहणे म्हणजे मन मारून जगणे होते आणि अख्खं आयुष्य कसं घालवायचं असं? मुलबाळ नाही आहे तोपर्यंत काही तरी निर्णय घेऊन मोकळं व्हावे असं मंजिरीला वाटत होते. मंजिरीने वेदजवळ विषय काढला.

‘‘तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मी मानसपासून घटस्फोट घेते. असं लपूनछपून किती दिवस भेटायचं. उद्या तुझंही लग्न होईलच की…तुला मी खरंच आवडते का?’’

‘‘आवडते म्हणून तर फिरवतो ना तुला राणी…’’

‘‘मी ठरवलंय, मी मानसला सगळं खरंखरं सांगणार आहे आणि मोकळी होणार आहे.’’

‘‘ठीक आहे, असंही तुझ्या आशाअपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि मी तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही याची खात्री देतो.’’

दुसऱ्याच दिवशी मंजिरीने स्वत:च्या आईबाबांना बोलावून घेतले. मानसलाही संध्याकाळी लवकर घरी बोलावले.

‘‘आईबाबा, मी आता जे काही बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल पण तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा. मला आता यापुढे मानससोबत विवाहबंधनात राहायचं नाही आहे. मानसकडे गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे पण फोरव्हीलर काढायला जर तो सतत पेट्रोल, पेट्रोल करत असेल तर तो पगार काय कामाचा? आज या फ्लॅटमधे येऊन तीन महिने झाले तरी फॅन, कुलर अशा साध्या वस्तूही हा माणूस घरात आणत नाही. जास्त हट्ट केला तर भांडण होतं आणि या माणसाचं शेवटचं वाक्य ‘तू घेऊन ये मग’ असे असते. आठवडयातून एक दिवस भाजी व महिन्यातून एकदा किराणा आणण्यापलीकडे या माणसाचा मला संसारात काहीही उपयोग नाही. पुढे मुलबाळ झाले तर गुंता वाढतच जाईल, त्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेले बरे.’’

‘‘जावईबापू, आताच्या मुली शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या. तुम्ही वेडींग मटेरियल म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात अपयशी ठरलात. तिचा जो निर्णय आहे त्यात मी काहीही बोलणार नाही. कारण तिने आनंदात वैवाहिक आयुष्य व्यतीत करावे एवढेच मलाही वाटते,’’ मंजिरीच्या बाबांनी विचार करून हळुवारपणे मत दिले.

‘‘अहो, काय बोलताय तुम्ही. तिच्या नादाला काय लागत आहात तुम्ही! अगं ये सोनु, लग्न कोणी असं मोडतं का लगेच. होईल सुधारणा हळुहळु त्यांच्यात. त्यांना एक संधी तरी दे.’’ मंजिरीची आई काकुळतीला येऊन बोलत होती.

‘‘आई, संधीचा प्रश्न नाहीए. मी जी काही कारणे सांगत आहे, तो त्यांचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही. असंही माझ्यासाठी कोणीतरी स्वत:ला बदलून घ्यावे हे मलाच पटत नाही.’’

‘‘मंजिरी मलाही कोणीतरी जबरदस्ती माझ्यासोबत रहावे हे मला आवडणार नाही. मी खूपच साधा मुलगा आहे. सतत ग्रिटींग देणे, गाणी म्हणणे, कलरफुल कपडे घालणे, पार्टी, टुरीझम हे मला नाही जमणार. मला माफ कर, तुला अपेक्षित असलेलं वेडींग मटेरिअल नाही आहे मी. मी तुला मोकळं करायला तयार आहे.’’

‘‘थांबा, मला अजून काहीतरी सांगायचे आहे. मी तुमचा लहान भाऊ वेदशी लग्न करणार आहे.’’

हे वाक्य ऐकताच मानसची नस तडकली. डोळे रागाने लाल झाले. पण एकही शब्द न बोलता दरवाजा जोरात आपटून तो घरातून निघून गेला.

सहा महीन्यांनी वेद आणि मंजिरीने रजिस्टर लग्न केले आणि पुन्हा संसार सुरु केला. वेदचे आईबाबा आणि मानस यांचा विरोध पत्करून हा विवाह पार पडला. दोन वर्षांनी पुन्हा मानसचा विवाह झाला. एक गावाकडची सुंदर मुलगी त्याला मिळाली. दोघांचाही संसार सुखाचा सुरू झाला. कालांतराने मंजिरी, मानस आणि वेद या तिघांनाही आपण घेतलेला निर्णय योग्यच होता हे जाणवले. केवळ समाज काय म्हणेल म्हणून नकोसे असलेले संसाराचे गाडे ओढण्यापेक्षा मोकळं बोलून वेळीच पायवाट बदललेली चांगली असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें