कथा * अर्चना पाटील

सौम्य अफिसमधून रात्री आठ वाजता घरी परतला. शुज काढून हॉलमध्येच बसला.

‘‘जेवण वाढू का तुम्हाला,’’ काव्याने विचारलं.

‘‘जेवण नको आहे मला. तू इथे बस. माझ्यासमोर.’’

‘‘मी बसते, पण तुम्ही जेवून तर घ्या आधी.’’

‘‘भुक नाहीए मला. तुला इथे बसायला सांगतो आहे. तेवढं कर.’’

‘‘काय झालंय?’’

‘‘हेच मला तुला विचारायचं आहे. काय प्रॉब्लेम आहे? हनीमुनची टुर कँन्सल का केलीस तू आईबाबांसमोर? आठ दिवस गेलो असतो घराबाहेर फिरायला. तेवढाच एकांत मिळाला असता आपल्याला.’’

‘‘मला नको आहे एकांत. मी या घरात केवळ कस्तुरीची आई म्हणून आले आहे. तुम्ही माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नका.’’

‘‘याचा अर्थ काय? नुसती नाटके नकोत मला. तुला जर एक बायको म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नव्हते तर लग्न का केलं माझ्याशी? जगात मुलींची काही कमी होती का? कस्तुरीसाठी आया तर भाडयानेही घेऊन आलो असतो मी. अनन्याच्या अपघाती निधनानंतर मला पुन्हा एकदा आयुष्याची नव्याने सुरूवात करायची होती आणि कस्तुरीची मावशी असल्याने तू परक्या बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेशील एवढेच या विवाहामागचे कारण आहे.’’

काव्या निरुत्तर झाली होती. आठ दिवस झाले होते लग्नाला. ती सतत सौम्यला टाळत होती. पण आज सासुसासरे गावी निघून गेले. त्यामुळे सकाळपासूनच तिला रात्रीची भीती वाटत होती. कारण आज सौम्यला टाळणे शक्य नव्हते.

‘‘तुम्ही जेवून घ्या आधी. आपण शांततेत बोलू नंतर.’’

‘‘कस्तुरी ?झोपली का?’’

‘‘हो, केव्हाच झोपली. तुम्ही जेवून घ्या ना. मी ताट वाढते.’’

काव्या किचनमध्ये ताट वाढायला गेली. सौम्यसुद्धा तिच्या मागेमागे गेला. ताट हातात घेऊन काव्या उभी होती.

‘‘जेवण नको आहे मला, तू फक्त कस्तुरीची आई आहेस ना मग माझ्या पोटाची चिंता कशाला करते आहेस? तू आधी बेडरूममध्ये चल. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवीत.’’

‘‘आपण आईबाबांच्या खोलीत जाऊ. बेडरूममध्ये कस्तुरी झेपली आहे.’’

सौम्य काव्याचा हात हातात पकडूनच तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन आला. काव्या एका भिंतीला चिटकून काहीशी घाबरतच उभी होती. सौम्य आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हते. लग्नानंतर प्रथमच ते दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ उभे होते.

‘‘आज मला एक मुलगी आहे. पण माझं नाव चालवायला मला आणखीन एक मुल हवंय. त्यासाठीच मी पुन्हा लग्न केले आहे. हे वाक्य कायम लक्षात असू दे आणि तुझ्यासोबत बोलताना आणि वागताना चुकलो तर तुमचं हे चुकत आहे असं बोलायलाही विसरू नको. बाकी तुझं नाटकं चालू देत.’’ सौम्य संतापात बोलून निघून गेला.

एक आठवडा ताणतणावातच गेला आणि आईबाबा गावाहून परत आले. सौम्यसुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता. दुपारच्या जेवणाला सगळे एकत्रच बसले. सौम्य एकटक काव्याकडे बघत होता. त्याच्या नजरेने ती घाबरून त्याच्याकडे पाहतच नव्हती. आईबाबा घरात असले की काव्या बिनधास्त असे, कारण सौम्यला टाळणे सहज जमत असे. जेवत असताना सौम्यला फोन आला. तेवढया वेळात सर्वजण जेवण करून निघून गेले. किचनमध्ये केवळ सौम्य आणि काव्या उरले. काव्याचे जेवणही झाले होते. पण सौम्यला जेवण वाढण्यासाठी तिला तिथेच त्याच्याशेजारी मांडी घालून बसावे लागले. सौम्य जेवत होता, पण काव्याला सतत भीती वाटत होती.

‘‘गुळाचा काला कर मस्त. कधीपासून खाल्ला नाही आहे.’’

‘‘काय?’’

‘‘येत नाही का तुला?आईला बोलव मग.’’

काव्याने कटरने गुळ चिरायला सुरूवात केली. सौम्य काव्याच्या घाबरट हालचालींचा आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता. काव्याने पोळी आणि गुळाचा काला करताच कस्तुरीसुद्धा तेथे पोहोचली.

‘‘अय्या मम्मीपण असाच काला बनवायची ना पप्पा.’’

कस्तुरीच्या त्या वाक्याने नीरव शांतता पसरली. सौम्यसुद्धा काला न खाताच उठून गेला. काव्यालाही वाईट वाटले. दिवसभर सौम्य बेडरूममध्येच होता. पण काव्या चुकुनसुद्धा बेडरूममध्ये आली नाही. संध्याकाळी आईबाबा गावातच लग्नाला जाणार होते.

‘‘सौम्य, कस्तुरी आमच्यासोबत लग्नाला येते आहे. तुम्ही दोघंही कुठेतरी फिरून या. बरं मग निघू आम्ही.’’ बाबा बोलून निघून गेले.

काव्या हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. सौम्यने आईबाबा जाताच घराचा दरवाजा आतून बंद केला आणि काव्याजवळ येऊन बसला. सौम्य जवळ येताच काव्या सावरून बसली.

‘‘किती दिवस एकांत टाळशील? लग्नाची बायको आहेस तू माझी. तू कितीही ठरवलं तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबतच घालवायची आहे. काही दिवसांनी माझेच नाही तुझेही आईबाबा नातू हवा म्हणून तुला त्रास देतील.’’ सौम्य नेहमीप्रमाणे बोलून निघून  गेला. काव्यासुद्धा नजर खाली करून बसुन राहिली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सौम्य कस्तुरीला शाळेत सोडण्यासाठी काव्यालाही घेऊन गेला. कस्तुरीला शाळेत सोडल्यानंतर टुव्हीलर घराच्या रस्त्याने न येता वेगळयाच दिशेने धावत होती. काव्या बेचैन झाली.

‘‘तुम्ही कुठे नेत आहात मला. तुम्ही गावाच्या बाहेर का जात आहात? मला घरी जायचं आहे. गाडी थांबवा. तुम्हाला कस्तुरीची शपथ आहे.’’

सौम्यने गाडी थांबवली. रस्त्यावर कोणीच नव्हते. काव्या पटकन खाली उतरली. सौम्यसुद्धा खाली उतरला.

‘‘मी काही चुकीचं वागतोय का?’’

‘‘या प्रश्नाचे उत्तर नाहीए माझ्याकडे. मला घरी सोडा.’’

‘‘नाही सोडणार घरी. मला जिथे जायचं असेल, तिथेच जाईन. तुझ्या बापाला फोन करतो तू अशी नाटकं करते आहेस रस्त्यावर हे सांगायला,’’ सौम्य संतापात बोलत होता.

‘‘मी बसतेय गाडीवर,’’ काव्याच्या डोळयात पाणी आलं. बोलताना…मधूनमधून दोघांचा एकमेकांना हलकासा स्पर्श होत होता. टुव्हीलर एका कॉलेजसमोर थांबली. एक तासाचा प्रवास केला दोघांनी. पण रस्ताभर शांतता होती. कॉलेज पाहताच काव्या गोंधळली. सौम्यने काव्याचं लॉ कॉलेजला अॅडमिशन घेतलं. अॅडमिशन फॉर्म भरताच टुव्हीलर सपसप घराच्या दिशेने निघाली. तोपर्यंत कडक ऊन पडलं होतं.

‘‘तुम्ही रूमाल बांधाना डोक्याला,’’ काव्या बोलायचा प्रयत्न करत होती.

‘‘आयुष्याने इतके चटके दिले आहेत की आता या उन्हाचं काही वाटत नाही. तू व्यवस्थित बस.’’

काव्याला खुपच शरमल्यासारखे होत होते. सौम्य किती चांगल्या मनाने मला आणत होता आणि मी विनाकारणच त्याच्याशी भांडत होते. आजही सौम्यने अॅडमिशनसाठी रजा टाकली होती. दुपारच्यावेळी काव्या बेडरूममध्ये पाठ टेकायला आली. सौम्यने  रोमँटिक गाणी लावली लॅपटॉपवर. अभी ना जाओ छोडकर…ये हँसी वादीयाँ…तुम मिले, दिल खिले…प्रत्येक गाणं काव्याला आवडत होतं. ती सौम्यकडे पाठ करून बेडवर झेपली होती, पण गालातल्या गालात हसत होती. तेवढयात काव्याच्या आईचा फोन आला.

‘‘कशी आहेस बेटा. बरं ते जाऊ दे. जावईबापूंना म्हणा पन्नास हजार मिळाले. तात्यांना अॅडमिट केलं होतं दवाखान्यात. आम्ही पगारावर फेडू म्हणा त्यांना. तू काळजी करशील म्हणून बोलले नाहीत तुला. आभार मानायला फोन केला गं मी. जावईबापूंना नाराज करू नकोस. खूपच हळव्या मनाचे आहेत ते. आपली अनन्या त्यांच्या आयुष्यातुन अचानक निघून गेली, त्यामुळे खुप खचले गं ते. पण मन मोकळं करत नाहीत ते. आता तुच अनन्याची जागा भरून काढ.’’

संध्याकाळी स्वत:हून काव्याने सौम्यसाठी शिरा बनवला. रात्री जेवण झाल्यावर स्वत:हून गुळपोळीचा काला केला.

‘‘बापरे, कस्तुरी तुझी नवी मम्मी खुपच खुष दिसते आहे आज’’

‘‘हो, कारण मम्मा आता वकील होणार आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार.’’

‘‘कस्तुरी, असं बोलू नये बाळा. तू जा आजीजवळ आणि झोप.’’

‘‘मी चुकीचे ऐकतोय का, कस्तुरीची मम्मी. तू तिला आजीजवळ पाठवते आहेस झोपायला.’’

काव्या लाजली आणि पटापट किचनमधील पसारा आवरून बेडरूममध्ये आली.

‘‘आईचा फोन होता संध्याकाळी. कौतुक करत होती तुमचं.’’

‘‘मी तर सगळयांनाच आवडतो तू सोडून.’’

‘‘मी कुठे म्हटले की तुम्ही मला आवडत नाहीत.’’

‘‘म्हणजे मी तुला आवडतो. मग इतके दिवस माझ्यापासून दुरदुर का पळत होती?’’

‘‘थोडा वेळ हवा होता मला. अनन्या गेली आणि लगेच तिच्या अर्धवट संसारात गुंतवलं मला आईबाबांनी. मला ग्रॅजुएशननंतर लॉ करायचे होते. या लग्नामुळे माझे शिक्षणसुद्धा थांबले. याशिवाय तुम्ही मला अनन्याची जागा कधीच देणार नाही असं वाटत होतं मला.’’

‘‘बावळट आहेस तू, अनन्या माझा भुतकाळ होती. मी तुला आधीच सांगितलं होतं की मला आयुष्याची नवीन सुरूवात करायची आहे म्हणून मी हे लग्न केलं आहे.’’

‘‘मला माझी चुक समजली. अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्यांनी माझे मन जिंकलेच. मला माफ करा आणि माझ्या चुका पदरात घ्या.’’

‘‘एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...