रविवारची एक संध्याकाळ

कथा * रमा अवस्थी

संध्याकाळ होत आली होती. पर्वताच्या मार्गावर संध्याकाळ अधिकच गडद होत चालली होती. शैलेन गाडीत बसून विचार करीत होता की, कुठे मुंबईतील गर्दी आणि कुठे ही डोंगरांमधील शुद्ध हवा. आज कितीतरी वर्षांनंतर तो आपल्या घरी आपल्या आईवडिलांना भेटायला निघाला होता. त्याचे घर कुर्ग येथे होते. कुर्ग निसर्ग सौंदर्य आणि कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची बहीण इरा, जी त्याची बहीण कमी आणि मैत्रीण जास्त होती ती अमेरिकेहून आली होती. जास्त करून त्याचे आईवडिल त्याच्यासोबत मुंबईत राहत, कारण आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या शैलेनकडे वेळ नव्हता. तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. परंतु यावेळी इरा आली होती आणि तिला यावेळेस आपला वेळ कुर्गमध्ये घालवायचा होता. तिला भेटण्यासाठी आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शैलेन ३ दिवसांसाठी आपल्या घरी निघाला होता. मायसोरच्या पुढे असलेली तांदळाची शेती आणि स्वच्छ, सुंदर गावांना मागे टाकत त्याची गाडी पुढे निघाली होती. त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नयनरम्य होता.

सहजच शैलेनला आठवण झाली की, इराला तिच्या बालपणीच्या मैत्रिणींना भेटून त्यांच्यासह शाळेत जाण्याची इच्छा आहे. यावेळेस तिच्याकडे वेळेची कमतरता नव्हती. इरा आणि तिच्या सर्व मैत्रिणी एकाच शाळेत शिकल्या होत्या. त्यांना पुन्हा एकत्र मिळून शाळेत जायचे होते आणि खूप वर्षांनंतर अखेर ती संधी मिळाली होती.

‘‘मला, बरेच झाले,’’ शैलेनने मनातल्या मनात विचार केला. तोही त्याच शाळेत शिकला होता. इरा आणि तिच्या मैत्रिणींपेक्षा तो ३ वर्षांनी मोठा होता. भाऊबहीण एकमेकांच्या सुखदु:खाचे वाटेकरी तर होतेच, पण सोबतच सर्व गुपिते एकमेकांना सांगत असत. एकमेकांची रहस्ये सर्वांपासून लपवून ठेवत. याची आठवण होताच शैलेनला हसू आले. त्याला इराच्या मैत्रिणी आठवल्या. त्या सर्व इराप्रमाणेच खोडकर होत्या. अनेकदा तो इराच्या मैत्रिणींना सोडायला त्यांच्या घरी जात असे. त्याने इराच्या बऱ्याच मैत्रीणींना सायकल चालवायला शिकविली होती.

या वेळेस तो इराला विचारणार होता की, तिच्या सर्व खोडकर मैत्रिणी कुठे आहेत व कशा आहेत? तसे तर फेसबूक आणि व्हॉट्सअपमुळे सर्व एकमेकांच्या संपर्कात होत्या. शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आणि चेहरे आठवू लागले. हे चेहरे आणि नावे त्याच्या आयुष्यासाठी विशेष महत्त्वाची नव्हती, पण या सर्वांसोबत त्याच्या बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या. शैलेनला आठवले की, जेव्हा त्याचे लग्न मुंबईत होणार, असे पक्के झाले होते तेव्हा इराच्या सर्व मैत्रिणी खूपच निराश झाल्या होत्या. त्या सर्वांना त्याच्या लग्नात सहभागी व्हायचे होते, कारण त्यांच्यासाठी भरपूर मजा करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नव्हती. नंतर जेव्हा रिसेप्शन कुर्गमध्ये होणार, असे ठरले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद परतला.

गाडी कॉफीच्या बागांमधून पुढे चालली होती आणि शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आठवू लागली होती. या चेहऱ्यांमधील एक वेगळा चेहराही होता ज्याची आठवण होताच शैलेनचा जीवनातील उत्साह अधिकच वाढल्यासारखे वाटायचे. तो चेहरा वेदाचा होता. वेदा ही इराच्या खास मैत्रिणींपैकी एक होती. वेदात असे वैशिष्ट्य होते की, ती तिच्या चेहऱ्यावरील खोडकरपणाला निरागसतेत सहज बदलू शकत होती. तसा तर शैलेन इराच्या सर्व मैत्रिणींना भेटत असे. पण एका रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले की, त्यानंतर त्याला वेदाला भेटताना अवघडल्यासारखे वाटू लागले होते.

शैलेन वेदाला शेवटचे भेटला त्या गोष्टीलाही आता १६ वर्षांहून अधिक काळ लोटला होता. ती शैलेनच्या रिसेप्शनलाही येऊ शकली नव्हती. त्या रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले होते की, जे आजही शैलेनला जगण्याची प्रेरणा देत असे. तसे तर एक सुखी आयुष्य जगण्यासाठी जे काही हवे ते सर्व त्याच्याकडे होते, पण तरीही रविवारची ती संध्याकाळ नसती तर सर्व अधुरे राहिले असते. १६ वर्षांपूर्वी सोशल मीडिया नव्हता. त्यावेळेस चिठ्ठी म्हणजे प्रेमपत्र लिहिली जायची. त्या रविवारच्या संध्याकाळी अशीच एक चिठ्ठी शैलेनला मिळाली होती. त्या चिठ्ठीत त्याचे खूप कौतुक करण्यात आले होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक मदतीसाठी (सायकल शिकविणे, गृहपाठासाठी मदत करणे इत्यादी) धन्यवाद देण्यासह शेवटी असे लिहिले होते की, शैलेनने त्या रात्री ८ वाजता फोनची वाट पाहा. पत्राच्या शेवटी वेदाचे नाव लिहिले होते.

शैलेन ती चिठ्ठी हातात घेऊन तिथेच बसून राहिला. तसे तर त्या चिठ्ठीत त्याच्यावर प्रेम असल्याबाबत कुठलाच उल्लेख उघडपणे केलेला नव्हता, पण चिठ्ठी लिहिणारी मुलगी वेदाच होती, हे स्पष्ट झाले होते. तिला तो आवडत असे. पहिल्या आणि कदाचित शेवटच्या वेळेस असे घडले होते की, एखाद्या मुलीने त्याचे कौतुक केले होते. महानगरांमध्ये आणि त्याच्या परदेशातील प्रवासात अनेक महिला मैत्रिणींनी आणि महिला सहकर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक केले होते, पण त्या सर्वंमध्ये नाटकीपणा जास्त होता. ही चिठ्ठी आणि त्यातील भावना शैलेनला दवबिंदूच्या थेंबाप्रमाणे सुखावह वाटत असे.

त्या काळात भावनांमध्ये खरेपणाची ऊब होती, आजच्याप्रमाणे त्या वरवरच्या, थंड नव्हत्या. आजही ती चिठ्ठी शैलेनने जपून ठेवली होती. जेव्हा कधी शैलेनला ती चिठ्ठी आणि त्यात लिहिलेले शब्द आठवायचे तेव्हा त्याचा थकवा बऱ्याच अंशी निघून जायचा.

तो त्या रविवारच्या संध्याकाळी फोनची वाट पाहत होता. पण वेदाने ८ वाजताची चुकीची वेळ निवडली होती. रविवारच्या रात्री शैलेनचे वडील सर्वांसोबत जेवत आणि फोनही त्याच खोलीत होता. वेदा फोन करण्यासाठी वेगळा एखादा दिवस निवडू शकत होती.

शैलेन रात्रीचे ८ वाजण्याची वाट पाहात होता. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे फोन आला आणि तोही ८ वाजताच. फोन वडिलांनी घेतला. जेव्हा ते घरी असायचे तेव्हा तेच फोन घ्यायचे. पण फोन कट झाला आणि पुन्हा आलाच नाही. पुढचे काही दिवस शैलेनने वेदाचा विचार करण्यात घालवले. त्यानंतर तो वेदाला भेटला, पण तेव्हा परिस्थिती अशी नव्हती की, तो तिला चिठ्ठीबाबत विचारू शकला असता. त्यानंतर हळूळू सर्व आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

शैलेन मुंबईला आला. इरा अमेरिकेला आणि वेदा बंगळुरुला गेली. त्यानंतर असे ऐकायला मिळाले होते की, वेदाचे लग्न बंगळुरुलाच झाले होते. पण शैलेन ती चिठ्ठी विसरू शकला नाही. आजही रविवरचीच संध्याकाळ होती आणि शैलेन आपल्या घरी कुटुंबियांना भेटायला चालला होता. आता त्याची गाडी वळणदार रस्यावरून घराच्या दिशेने निघाली होती. अचानक मोबाईल वाजला. इराने फोन केला होता.

‘‘आणखी किती वेळ लागेल?’’ इराने उतावीळपणे विचारले.

‘‘बस आणखी अर्धा तास… कॉफी तयार ठेव… मी पोहोचतोच आहे,’’ शैलेनने उत्तर दिले.

तेवढयात इराने विचारले, ‘‘ओळख कोण आहे माझ्यासोबत?’’

तिने अचानक विचारलेल्या या प्रश्नामुळे शैलेन गोंधळला. कोण असेल बरं?

तितक्यात इरा म्हणाली, ‘‘अरे माझी सर्वात प्रिय मैत्रीण वेदा.’’

शैलेनचे हृदय धडधडू लागले. त्याला पुन्हा एकदा ती चिठ्ठी आणि रविवारची संध्याकाळ आठवली. तो स्वत:शीच हसला. वेदा आली होती, या गोष्टीचा त्याला आनंद झाला. संध्याकाळ गडद होत चालली होती. शैलेन घरी पोहोचला. तेथे पोहोचताच आईवडिलांच्या पाया पडला.

तेवढयात मागून आवाज आला, ‘‘हॅलो, कसा आहेस?’’

शैलेनने मागे वळून पाहिले असता वेदा समोर उभी होती.

‘‘हॅलो वेदा, कशी आहेस?’’

शैलेनने तिच्याकडे पाहात हसत विचारले.

‘‘मजेत,’’ वेदाने उत्तर दिले.

शैलेनने पाहिले की, वेदात फारसा बदल झाला नव्हता. तेच डोळे, तसाच चेहरा, तोच निरागसपणा आणि या सर्वांमागे तोच खोडकर स्वभाव. काही औपचारिक गोष्टी आणि एकमेकांच्या कुटुंबाची विचारपूस केल्यानंतर त्यांनी कॉफी प्यायला सुरुवात केली. शैलेन मनोमन विचार करू लागला की, वेदा रविवारची ती संध्याकाळ विसरली असेल का? तसे पाहायला गेल्यास आठवणीत ठेवण्यासारखे होते तरी काय? एका चिठ्ठीचा विसर पडणे सोपे होते. पण शेवटी काहीही झाले तरी ती चिठ्ठी वेदाने स्वत:च्या हाताने लिहिली होती. स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीला ती कशी काय विसरली? तसेही आजच्या फेसबूकच्या युगात एका छोटयाशा चिठ्ठीचे महत्त्व तरी कितीसे असणार? पण त्या काळात चिठ्ठीमुळेच दोन हृदये जोडली जात होती.

त्या चिठ्ठीने शैलेनला एक जाणीव करून दिली होती. कोणाला तरी आपण आवडत असल्याची सुखद जाणीव.

ही जाणीव जीवनात अत्यावश्यक असलेल्या हवा आणि पाण्याइतकी महत्त्वाची नसली तरी तिचे असणे जीवन आणखी सुंदर बनविते. पण आश्चर्य म्हणजे वेदाला हे काहीच आठवत नव्हते. वेदा आणि शैलेन, दोघेही आपापल्या आयुष्यात गर्क होते, हे खरे असले तरी भूतकाळात जगलेल्या काही क्षणांची आठवण नव्याने जागी करायला काहीच हरकत नव्हती. म्हणूनच वेदाने ज्या भावना एके दिवशी पत्राच्या रुपात शब्दबद्ध केल्या होत्या त्या भावना शैलेनच्या नसतानाही त्याला आठवत होत्या, पण असे वाटत होते की, वेदा विसरून गेली होती.

शैलेनला या सर्वांची जाणीव होताच अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. रात्रीचे १० वाजले होते. तो बाल्कनीत बसला होता. तेवढयात इरा कॉफी घेऊन आली. शैलेन तसे तर इरापासून काहीच लपवित नसे, पण न जाणो कोणता विचार करून वेदाच्या चिठ्ठीबाबत त्याने इराला काहीच सांगितले नव्हते. आज अनेक वर्षांनंतर शैलेनला असे वाटू लागले की, वेदाच्या चिठ्ठीबद्दल इराला सांगायला हवे. इरा तेथेच बसून कॉफी पीत होती आणि आपल्या मोबाईलवर काहीतरी पाहात होती.

‘‘वेदा कुठे कामाला जाते का?’’ शैलेनने विषयाला हात घातला.

‘‘हो’’, मोघम उत्तर देऊन इरा पुन्हा मोबाईल पाहू लागली.

‘‘कुठे?’’ शैलेनने विचारले.

‘‘तिचे बंगळुरूमध्ये एनजीओ आहे.’’ इराचे लक्ष अजूनही मोबाईलमध्येच होते.

शैलेन पुढे बोलण्यासाठी उगाचच गळा खाकरत म्हणाला, ‘‘तुला माहीत आहे का, वेदाने मला एक चिठ्ठी लिहिली होती. खूप आधी, जेव्हा तुम्ही महाविद्यालयात शिकत होता. मी त्या चिठ्ठीला कोणतेच उत्तर दिले नव्हते.’’

आता मात्र इराने मोबाईल बाजूला सारत भावाकडे पाहिले. ‘‘कोणती चिठ्ठी, तीच का, जी छोटूच्या हातून पाठविण्यात आली होती?’’ इराने हसून विचारले.

‘‘हो, हो, तीच… तुला माहीत आहे का?’’ शैलेनला इराने त्या चिठ्ठीचा विषय हसण्यावारी घेतल्याचा राग आला होता. तो सोडून त्या चिठ्ठीशी जोडले गेलेले इतर सर्वच ही गोष्ट एवढी हसण्यावारी का घेत होते?

‘‘ती चिठ्ठी वेदाने लिहिली नव्हती. मधू आणि चंदाने लिहिली होती,’’ इराने जांभई देत सांगितले.

‘‘याचा अर्थ काय? मधू आणि चंदाने लिहिली होती, कशासाठी?’’ शैलेनने विचारले. मधू आणि चंदाही इराच्या मैत्रिणी होत्या आणि त्याही खूपच खोडकर होत्या.

शैलेनने विचारलेला प्रश्न ऐकून इरा हसू लागली. ‘‘अरे भावा, तू विसरून गेलास का? तो दिवस एप्रिल फूलचा होता.’’

मधू आणि चंदाचा चेहरा शैलेनच्या डोळयांसमोर आला.

‘‘पण चिठ्ठीखाली नाव वेदाचे होते.’’ शैलेनने सांगितले.

‘‘आता कोणाचे तरी नाव लिहावेच लागणार होते, त्यामुळे वेदाचे नाव लिहिले,’’ इराने उत्तर दिले.

‘‘वेदाला ही गोष्ट माहिती होती का?’’ शैलेनने आश्चर्यचकित होत विचारले.

‘‘कोणती गोष्ट? चिठ्ठीची का? सुरुवातीला काहीच माहीत नव्हते, पण नंतर त्यांनी मला आणि वेदाला सांगितले होते की, त्यांनी १ एप्रिल असल्याने तुला वेदाच्या नावाने मूर्ख बनवले होते,’’ इराने आळसावत सांगितले.

‘‘पण त्यांनी वेदाचे नाव लिहायला नको होते,’’ शैलेन पुटपुटला.

‘‘हो, लिहायला तर नको होते, पण त्यामुळे काही फरक पडणार नव्हता, कारण त्यांना माहीत होते की, तू एक सज्जन मुलगा आहेस,’’ डोळयांवर प्रचंड झोप असतानाही इराने उत्तर दिले.

शैलेन मनोनम हसत असा विचार करू लागला की, तो १ एप्रिल संपूर्ण १६ वर्षे साजरा झाला, असे कदाचित पहिल्यांदाच घडले असेल. पण काही का असेना, भलेही तो त्याला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न असला तरी त्या घटनेने त्याच्या जीवनातील आनंदात भर घातली होती. अजाणतेपणी का होईना, पण त्या मुलींनी असे काही केले होते ज्यामुळे शैलेनच्या जीवनातील आनंद वाढला होता.

समानतेचा काळ

कथा * प्राची भारद्वाज

गिरीश सायंकाळी ऑफिसातून घरी आला, तेव्हा सगळं घर अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. पण आता त्याला या गोष्टीची सवय झाली होती. अशावेळी त्याला चेतन भगतचं वाक्य आठवायचं, ‘‘घरच्या पुरूषानं गरम पोळीचा हट्ट धरला नाही तर त्या घरातली स्त्री घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसह स्वत:चं करियरही उत्तम सांभाळू शकेल,’’ या वाक्यामुळे तो शांत चित्ताने वावरू शकायचा. सुमोनाच्या अन् त्याच्या पहिल्या भेटीत तिनं ऐकवलं होतं, ‘‘माझा स्वत:चा मेंदू आहे तो स्वत:चा विचार करतो अन् त्याप्रमाणेच चालतो.’’

तिचा तडकफडक स्वभाव, तिचा फटकळपणा वगैरे लक्षात आल्यावरही तिच्यावर भाळलेल्या गिरीशनं तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. अन् एकदा लग्न झाल्यावर त्यानं कायम सहकार्यही केलं.

घरकामात तो तिला जमेल तेवढी मदत करायचा. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तो वॉशिंगमशीनमधून कपडे धुवून वाळत घालायचा. तेवढ्या वेळात सुमोना दोघांचे डबे अन् ब्रेकफास्ट बनवायची. बाई नाही आली तर सुमोना केरफरशी करायची, तोवर तो भांडी धुवून ठेवायचा. पण त्याला स्वयंपाकघरात मात्र काही करता येत नव्हतं. एकटा कधीच राहिला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर स्वयंपाक करायची वेळच आली नव्हती. आधी आईच्या हातचं जेवायचा. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, तेव्हा अॅफिसच्या कॅन्टीनचं जेवण जेवू लागला. तेवढ्यात घरच्यांनी लग्न करून दिलं अन् सुमोनानं स्वयंपाकघर सांभाळलं.

घरात आल्यावर एक ग्लास गार पाणी पिऊन गिरीश घर आवरू लागला. अजून सुमोना घरी आली नव्हती. आज बाईनं दांडी मारली. त्यामुळे सकाळी अगदी गरजेचं तेवढंच घरातलं आटोपून दोघंही ऑफिसला गेली होती.

‘‘अरे, तू कधी आलास? मला यायला जरा उशिरच झाला.’’ घरात येता येता सुमोनानं म्हटलं.

हॉलमधलाला पसारा आवरत गिरीश म्हणाला, ‘‘हा काय एवढ्यातच आलोय, जेमतेम पंधरा मिनिटं झाली असतील.’’

‘‘आज आमच्या टीममध्ये पुन्हा जोरदार वादविवाद झाला. त्यामुळेच थोडा उशीर झाला. त्या संचितला ओळखतास ना?’’

तो म्हणाला, ‘‘बायकांना प्रमोशन सहज मिळतं…बस्स, बॉसकडे हसून बघायचं की मिळालं प्रमोशन…’’ हे काय बोलणं झालं? मला रागच आला…मीही ऐकवलं त्याला, ‘‘आम्ही ही अभ्यास करतो, मेहनतीनं चांगले मार्क मिळवून डिग्री घेतो अन् कॉम्पिटिशनमध्ये बरोबरीनं राबून नोकरीतलं प्रमोशन मिळवतो. खरं तर आम्हालाच उलट घर, मुलं अन् नोकरी सांभाळताना जास्त श्रम करावे लागतात. ग्लास सीलिंगबद्दल ऐकलं नाहीए बहुतेक.’’

‘‘तू मानतेस ग्लास सीलिंग? तुला तर कधीच कुठल्या भेदभावाला सामोरं जावं लागलं नाहीए?’’

‘‘मला सामोरं जावं लागलं नाही कारण मी एक समर्थ, सशक्त स्त्री आहे. मी अबला नाही. कुणा पुरूषानं माझ्याशी स्पर्धेत जिंकून दाखवावं…’’

‘‘बरं बाई, पण आता या पुरूषावर कृपा करून अत्याचार करू नकोस. जरा लवकर जेवायवा घाल.’’ गिरीशला भयंकर भूक लागली होती.

‘‘आता? एवढयात ग्लास सीलिंगबद्दल बोललो ना आपण? मी ही एवढ्यातच ऑफिसातून आले आहे. मी ही दमले आहे अन् तुला…’’

‘‘काय करू? जेवायखायच्या बाबतीत तुझ्यावरच आश्रित आहे मी…एरवी मदत करतंच असतो ना? आता तुझ्यावर अत्याचार करतो असा चेहरा करू नकोस, फक्त खिचडी केलीस तरी चालेल.’’

सुमोनानं नाइलाजानं स्वयंपाक केला, कारण मागे दोन तीनदा तिनं उशीर झाल्यामुळे बाहेरून जेवण मागवलं होतं. तेव्हा गिरीशचं पोट बिघडलं हातं. गिरीश स्वच्छताप्रिय होता तर सुमोनाला घरातली घाण किंवा पसारा त्रासदायक वाटत नसे. जेवायच्या टेबलावरचा पसारा ती मजेत सोफ्यावर ढवळून जेवण मांडायची, अन् हॉलमध्ये बसायच्यावेळी सोफ्यावरचा पसारा पुन्हा डायनिंग टेबलवर ठेवायची.

गिरीशनं काही म्हटलंच तर उलटून म्हणायची, ‘‘इतकं खटकतंय तर तूच ठेवा ना उचलून… मीही तुझ्यासारखीच नोकरी करतेय. ऑफिस सांभाळतेय. ऑफ्टर ऑल समानतेचा काळ आहे. स्त्री-पुरूष समान आहेत.’’

एकदा गिरीशची आई आली होती. दोघांमधलं हे असं संभाषण ऐकून तिला राहवलं नाही. ती म्हणाली, ‘‘बरोबरीचा मुद्दा अगदी बरोबर आहे. समानता असायला हवीच. पण एकूणच घर, संसार, समाज नीट चालण्यासाठी काही कामं स्त्रीपुरूषांमध्ये विभागली गेली आहेत. दोघांनी मिळून कामं करावीत हे बरोबर आहे. पण तरीही काही क्षेत्र ही स्त्रियांची अन् काही पुरूषांची असतात.’’

त्यांचं बोलणं तिनं एका कानानं ऐकलं अन् दुसऱ्यानं सोडून दिलं.

सुमोनाचा हेकेखोरपणाही गिरीश सहन करत होता. त्यांच्या खोलीत त्यानं सुमोनाला मिठीत घेतलं तरी ती त्याला झिकारायची, ‘‘मी पुढाकार घेईन याची वाट का बघत नाहीस तू? प्रत्येक वेळी तुझीच मर्जी का म्हणून?’’

‘‘मी तुझ्यावर बळजबरी करत नाहीए सुमोना, तुझीइच्छा नसेल तर राहील…’’

‘‘माझ्यावर बळजबरी कुणीच करू शकणार नाही…तूसुद्धा!’’

‘‘अगं मीही तेच म्हणतोय ना? मी बळजबरी करत नाहीए…यात भांडायचं कशाला?’’ सुमोनाच्या अशा आठमुठ्या अन् आखडू वागण्यानं गिरीश त्रस्त होता.

काही महिन्यांनंतर सुमोनाची आई त्यांच्याकडे आली. मुलीचा संसार बघून तिला बरं वाटलं. पण त्यांच्यासमोर बरेचदा गिरीश सुमोनाची बरोबरीची, समानतेची वादावादी झाली. गिरीशला अचानक ऑफिसच्या टूरवर जावं लागलं. त्यानं ऑफिसातून सुमोनाला फोन केला, ‘‘जरा माझी बॅग भरून ठेव ना, प्लीज…’’

‘‘अरे व्वा? सरळ हुकूम करतोय बॅग भरून दे म्हणून. मला माझी कामं नाहीत का? स्वत:च काम स्वत: करायला काय झालं? त्याला टूरवर जायचंय तर त्यानं लवकर घरी येऊन आपली बॅग भरून घ्यावी. लग्नाच्या आधीही करतच होता ना स्वत:चं काम? ऑफ्टर ऑल समानतेचा काळ आहे. बरोबरीचे हक्क आहेत.’’

सुमोनाच्या आईला तिचं हे वागणं खटकलं, ‘‘हे काय सुमोना? तू त्याची बायको आहेस, त्याचं काम तूच नको का करायला? घर, संसार मिळावा म्हणून पुरूष लग्न करतो. एकटं राहायचं तर लग्नाची गरजच काय? उद्या तू म्हणशील मुलं मीच का जन्माला घालायची? गिरीशनं घालावीत.’’

‘‘तू तर माझ्या सासूसारखीच बोलते आहेत,’’ आईचं बोलणं सुमोनाला आवडलं नाही.

आई प्रेमाने म्हणाली, ‘‘अगं, आई असो की सासू, तुला सांगतील ते चांगलंच सांगतील. त्यांच्याकडे अनुभव असतो जगाचा, संसाराचा. म्हणून त्यांचं म्हणणं ऐकावं.’’

‘‘पण आई, मी ही त्याच्यासारखीच शिकलेली आहे. गिरीशसारखीच माझीही नोकरी आहे, त्याच्या एवढंच कमावते आहे, मग मी एकटीनंच का संसार ओढायचा? तुला ठाऊक आहे की मी नेहमीच स्त्री मुक्तीची अन् स्त्रीपुरूष समानतेची समर्थक होते अन् आहे.’’

‘‘तू थोडा अतिरेक करते आहेस सुमोना. अगं स्त्रीवाद म्हणजे पुरूषांशी वैर करणं किंवा सतत भांडण करणं नाही. संसार पतिपत्नीच्या समंजपणानं अन् सहकार, सहचार्याने चालतो. गिरीश तर तुला खूपच समजून घेतो. सहकार्य करतो, नुसती त्यानं बॅग भरून दे म्हटलं तर इतकं आकांडतांडव कशाला?’’

आईचं म्हणणंही सुमोनानं उडवूनच लावलं.

लग्नाला वर्ष होता होता गिरीशनं स्वत:ला सुमोनाच्या अपेक्षेनुरूप बदल घडवून आणला होता. त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं अन् बायकोला सुखात ठेवावं, तिनं सुखी रहावं अशी त्याची इच्छा होती. पण सुमोनाचा स्त्रीवाद काही थांबायला तयार नव्हता. गिरीशचे काही सहकारी घरी आले होते. त्यांच्या ऑफिसच्या गप्पा सुरू झाल्या, तेव्हा त्यांच्या बॉसचा विषय निघाला. ‘‘बॉस मॅडम इतक्या आखडू का आहेत? तेच कळत नाही. सरळ शब्दात तर त्या बोलतच नाहीत.’’

गिरीशच्या एका मित्रानं एवढं म्हटलं अन् सुमोना अशी बिथरली…‘‘एका स्त्रीला बॉस म्हणून सहन करणं तुम्हा पुरूषांना कसं मानवेल? हाच बॉस पुरूष असता तर त्याला सहन केलंच असतं ना? पण इथं एक स्त्री आहे तर लागले तिची चेष्टा करायला, तिला नावं ठेवायला…तिच्याशी जमवून घ्यायला नको का तुम्ही हाताखालच्या लोकांनी?’’

‘‘अरेच्चा? वहिनींना एकाएकी काय झालं?’’ सगळेच चकित झाले.

तिच्या वागण्यानं गिरीशही वैतागला…‘‘सुमोना, तू आम्हा सर्वांना ओळखतेस, आमच्या बॉसला तू बघितलंही नाहीस अन् तिची कड घेते आहेस?’’ त्यानं म्हटलं.

एव्हाना गिरीशच्या लक्षात आलं होतं की सुमोनाच्या मनात पुरूषांविषयी विनाकारण राग आणि द्वेष आहे. ती पुरूषाला बाईचा शत्रूच मानते. स्वत:ला ती श्रेष्ठ स्त्री समजते अन् घरातल्या कामातही विनाकारण बरोबरी, समानता हे विषय आणत असते.

एका रात्री गिरीश, सुमोना जेवायला बाहेर गेली होती. सुमोनाच्या आवडत्या हॉटेलात, तिच्या आवडीचे पदार्थ होते. जेवण झाल्यावर दोघं त्यांच्या गाडीत बसून घरी यायला निघाली. तेवढ्यात तीन मोटरसायकलवर ८-९ जणांचं टोळकं त्यांच्या गाडीच्या मागे लागलं. मोठमोठ्यानं अचकट विचकट बोलत, आरोळ्या ठोकत ते शिट्याही वाजवत होते.

‘‘मी आधीच म्हटलं होतं. या रस्त्यानं नको जाऊयात. तुम्हाला हाच रस्ता नेमका का घ्यावासा वाटला? आता काय करायचं?’’ सुमोना खूपच घाबरली होती.

‘‘काय करणार? घाबरायचं नाही. ऑफ्टर ऑल हा समानतेचा काळ आहे?’’

गिरीशचं बोलणं ऐकून सुमोना गारच पडली. तिचं वाक्य आज गिरीशनं म्हटलं होतं.

घाबरलेल्या सुमोनानं गिरीशला म्हटलं, ‘‘गिरीश, तू माझा नवरा आहेस, मला सुरक्षित ठेवणं ही तुझीच जबाबदारी आहे. बरोबरी समानता आपल्या जागी अन् मला सुरक्षित ठेवणं, गुंडांपासून वाचवणं आपल्या जागी. तुला तुझं कर्तव्य करावंच लागेल.’’

गिरीशनं काही उत्तर दिलं नाही. फक्त गाडीचा स्पीड एकदम वाढवला अन् काही मिनिटातच गाडी सरळ पोलीस चौकीत येऊन थांबली. तिथं पोहोचताच ते टोळकं त्यांच्या मोटरसायकलसह पळून गेलं. शांतपणे गिरीशनं गाडी मुख्य रस्त्यावर आणून सरळ घर गाठलं. दोघांनीही हुश्श केलं. कुणीच काहीही बोललं नाही. गिरीश गप्प होता कारण त्याला सुमोनाला विचार करायला वेळ द्यायचा होता. सुमोना गप्प होती. कारण आज तिला तिची चूक उमगली होती.

सकाळी दोघं उठून आपापलं आवरून ऑफिसला निघून गेली. संभाषण नव्हतंच, मात्र अबोला भांडणातून आलेला नसल्यानं तणाव जाणवत नव्हता. ऑफिसात काम करताना तिच्या कॉम्प्युटरवर गिरीशचा मेसेज दिसला.

‘‘सुमोना, तू हिंदीतल्या ख्यातनाम कवींचं नाव ऐकलं आहे? विनोदी कवी म्हणून काका हाथरसी ओळखले जातात. त्यांचीच ही कविता आहे :-’’

‘दुलहन के सिंदूर से शोभित हुआ ललाट, दूल्हेजी के तिलक को रोली हुई अलौट. रोली हुई अलौट, टौप्स, लौकेट, दस्ताने, छल्ला, बिछुआ, हार, नाम सब हैं मर्दाने. लालीजी के सामने लाला पकड़े कान, उन का घर पुर्लिंग है, स्त्रीलिंग दुकान. स्त्रीलिंग दुकान, नाम सब किस ने छांटे, काजल, पाउडर हैं पुर्लिंग नाक के कांटे. कह काका कवि धन्य विधाता भेद न जाना, मूंछ मर्दों की मिली किंतु है नाम जनाना…

अर्थात, स्त्री अन् पुरूषातला झगडा सनातन आहे. तरीही दोघं एकमेकांचे पुरक, सहाय्यक आहेत ही गोष्ट तेवढीच खरी आहे. ज्यांना हे कळत नाही, त्यांचं सोड, पण नवरा बायकोनं एकमेकांशी भांडणं, सतत बरोबरी करणं यानं कोणताच संसार सुखी होत नाही. सुखी संसारातच वंशवेल विस्तारते. घरातल्या मुलांनाही चांगले संस्कार मिळतात. सुमोना, तुझ्या तकलादू स्त्री वादातून बाहेर पड. मी स्वत: स्त्रियांचा सन्मान करतो हे तू जाणतेस. माझं प्रेम ओळख,. त्यातला खरेपणा जाणून घे…’’

त्या सायंकाळी गिरीश घरी आला, तेव्हा टेबलवर गरमागरम जेवण तयार होतं. छानपैकी नटलेली सुमोना हसऱ्या चेहऱ्यानं त्याची वाट बघत होती. तो आत येताच तिनं त्याला मिठी मारली अन् ती म्हणाली, ‘‘माझॆ काम मी केलंय हं! आता तुझी पाळी.’’

जेवण झाल्यावर गिरीशनं सुमोनाला उचलून घेतलं अन् तो बेडरूमकडे निघाला. हसऱ्या चेहऱ्यानं सुमोना त्याला बिलगली.

वारसा

कथा * पल्लवी पुंडे

अलीकडे वारंवार माझ्या मनात येतं की माणसाला त्याच्या कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात. म्हणजे मी टेलिव्हिजनवरच्या क्रिमिनल आणि अध्यात्मिक कार्यक्रमांनी भारावून गेलोय म्हणून असं म्हणतोय असं समजू नका. मी रोज धर्मग्रंथ वाचतो असंही समजू नका. मी कुणा बुवा बांबांचा भक्तही नाही अन् पश्चात्तापाचं महत्त्व मला कळलंय असंही नाही.

सध्या माझी मुलगी राशी हिची मैत्री, तिच्या रमण नामक सहकाऱ्याशी फारच वाढली आहे. रमण विवाहित आहे, हे माझ्या काळजीचं कारण आहे. राशी एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर आहे. रमण सीनिअर मॅनेजर आहे. राशी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. बँकेतही तिच्या हुशारीचं कौतुक होतं. पण रमणबरोबर तिची जवळीक वाढतेय हे मला खटकत होतं. खरंतर मला मनातून फार भीती वाटत होती. माझी पत्नी शोभा आमच्या मुलाकडं न्यू जर्सीला यू.एस.ला गेली होती. तिला तिथं असं काही कळवणं योग्य नव्हतं. जे काही करायचं होतं, जो निर्णय घ्यायचा होता, तो मलाच घ्यायचा होता. आज माझा भूतकाळ मला वाकुल्या दाखवत माझ्यासमोर उभा होता.

मुजफ्फरनगरला मी नव्यानंच बदलून गेलो होतो. बिऱ्हाड अजून दिल्लीतच होतं. शोभाला दुसरं बाळ होऊ घातलेलं. पहिला मुलगाही अजून तसा लहानच होता. इथं मी जेमतेम दोनच वर्षं काढणार होतो. त्यामुळे बिऱ्हाड मांडायचा विचार नव्हता.

बँकेला जवळ असं एक छोटसं घर भाड्यानं घेतलं होतं. शेजारी एक कुटुंब राहत होतं. एक तरूण स्त्री आणि तिची दोन मुलं, बहुधा जुळी असावीत. तिसरी-चौथीत शिकत असावीत. बँकेत काम करणाऱ्या रमेशकडून समजलं होतं की ती स्त्री विधवा आहे. तिचा नवरा ही बँकेतच होता. काही वर्षांपूर्वी तो वारला होता. बँकेनं त्याच्या पत्नीला नोकरीवर ठेवून घेतलं होतं. मधल्या काळात ती सासरच्या लोकांबरोबर राहत होती, पण आता तिनं इथं स्वतंत्र बिऱ्हाड केलं होतं.

‘‘विनय सर, सांभाळून रहा हं! बाई एकदम चालू आहे.’’ रमेशनं मला सांगितलं होतं. रमेश तिला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता हे मला बँकेतल्याच एका कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं. तिनं त्याची डाळ शिजवू दिली नव्हती. म्हणताना रमेश तिच्याबद्दल इथं तिथं वाईट बोलत होता.

सौजन्याचा गुण तर आम्हाला वारसा हक्कानं मिळाला आहे. शेजाऱ्यांशी प्रेमानं वागा, त्यांना मदत करा, ही आम्ही लहानपणापासून ऐकलेली शिकवण आहे. शेजारी एखादी तरूण देखणी स्त्री असते, तेव्हा तर आम्ही पुरूष मंडळी अधिकच सौजन्यानं वागतो.

मी त्या दिवशी ऑफिसातून परतलो, तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यांवर बसून होती.

‘‘तुम्ही इथं का बसला आहात?’’ मी विचारलं. ‘‘सर, काय झालं…म्हणजे, माझी किल्ली हरवलीए. मुलं येतीलच आता…त्यांच्याकडे असते दुसरी किल्ली. तोवर इथं बसून वाट बघतेय त्यांची.’’ ती कशीबशी बोलली.

‘‘तुम्ही काळजी करू नका माझ्या घरात या.’’

‘‘अं?’’

‘‘म्हणजे, माझ्या घरात येऊन बसा. मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो.’’

‘‘मी इथंच थांबते…तुम्ही किल्लीचं बघा.’’

‘‘ठिक आहे.’’

थोड्याच वेळात रचनाचं घर उघडलेलं होतं अन् मी आत सोफ्यावर बसून तिच्या हातचा चहा घेत होतो. दहा मिनिटातच तिची मुलंही आली. मुलं समजूतदार अन् गोड होती. थोड्याच वेळात माझी त्यांची छान बट्टी जमली.

माझ्या मुलालाही कधी एवढा वेळ दिला नसेल जेवढा मी निखिल आणि अखिलसाठी देत होतो. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं, रविवारी त्यांना फिरायला नेणं हे अगदी सहज अन् मजेमजेत सुरू होतं. मी तिला हक्कानं एकेरी नावानं संबोधू लागलो होतो. तिनं त्यावर कधी आक्षेपही घेतला नव्हता. प्रत्येक गोष्टीत ती माझा सल्ला घ्यायची. शाळेच्या पिकनिकला तिनं मुलांना पाठवलं होतं, ते माझ्याच सल्ल्यावरून.

बँकेत दोन दिवसांचा स्ट्राइक होता. आम्ही घरीच होतो. नेहमीच सुट्टीच्या दिवशी मी रचनाच्या घरी जेवायला जात असे. पण आज मुलं घरी नव्हती. ती शाळेच्या पिकनिकला गेली होती.

दारात उभं राहून मी विचारलं, ‘‘आत येऊ शकतो का?’’

‘‘विनय सर? तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली?’’

आम्ही दोघं जेवलो. मला जाणवलं आज रचना जरा बेचैन वाटतेय. तिनं मागचं आवरलं, मग आम्ही दोघं टीव्ही बघत बसलो. रचनाला मी विचारलं, ‘‘बरं नाहीए का?’’

‘‘डोकं दुखतंय सकाळपासून.’’ ती उत्तरली.

मी तिच्याजवळ सोफ्यावर जाऊन बसलो अन् हलक्या हातानं तिचं कपाळ चेपायला लागलो. कपाळ दाबता दाबता माझे हात तिच्या कानशिलांवरून खांद्यावर आले. तिनं डोळे मिटून घेतले होते. दोघांच्याही शरीराची थरथर एकमेकांना जाणवत होती. काही तरी बोलण्यासाठी तिनं ओठ उघडले अन् मी ते माझ्या ओठांनी बंद केले.

त्यानंतर तिनं डोळे उघडले नाहीत. आम्ही एकमेकांच्या जवळ जवळ येत गेलो. संकोच वाटत नव्हता, उलट जणू दोघांच्या देहांना याच जवळीकीची आस होती असं वाटत होतं. मनानं मनाची, देहानं देहाची भाषा समजून घेतली होती.

‘‘डोळे उघडू नकोस आज मी तुझ्या डोळ्यात मुक्कामाला आहे.’’ मी तिच्या कानांत हळूवार बोललो.

किती वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो कुणास ठाऊक. तिच्यापासून दूर होत मी म्हटलं, ‘‘रागावली नाहीस ना माझ्यावर?’’

‘‘मला स्वत:चाच राग येतोय. तुम्ही विवाहित आहात…असं घडायला नको होतं.’’

‘‘रचना, शोभाशी माझं लग्न म्हणजे एक तडजोड आहे. आमच्या घरच्यांनी लग्न करून दिलंय आमचं. तेच नातं कसंबसं निभावतोय मी. प्रेमाची जाणीव आज प्रथमच तुझ्या संगतीत झाली आहे.’’

‘‘पण, लग्न ते लग्नच ना?’’

‘‘रचना, सप्तपदी झाली म्हणजे प्रेम निर्माण होतं का? लग्नानंतर नवराबायकोत सेक्स घडतोच. पण प्रेम नाही निर्माण होत. तुला पश्चात्ताप होतोय का?’’

‘‘विनय, तुम्ही म्हणता त्या प्रेमाचा साक्षात्कार मलाही झाला आहे. प्रेम शक्ती देतं. वासना असेल तर पश्चात्ताप होतो. माझं लग्न झालं त्या माणसावर मी प्रेम करू शकले नाही. फक्त त्यानं माझं शरीर वापरलं. मनापर्यंत तो पोचलाच नाही. नंतर जे पुरूष जवळ येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मीच जवळ येऊ दिलं नाही कारण त्यांच्या डोळ्यातली वासना…त्यांच्या गलिच्छ विचारांचाच तिटकारा वाटायचा मला. तुम्ही मात्र मला नेहमीच मानानं वागवलंत. माणूस म्हणून वागवलंत…अन् मी माझं शरीर तुमच्या स्वाधीन केलं. विधवा स्त्रीनं दुसरं लग्न केलं तर आता चालतं समाजाला. पण असे संबंध अनैतिकच ठरतात. मी आज चारित्र्यहीन ठरले आहे.’’

त्यानंतर आम्ही सततच एकमेकांबरोबर रात्री घालवू लागलो. तिची मुलं झोपली की सकाळीच उठायची. आम्ही निर्धास्त होतो. अधूनमधून सिनेमा, शॉपिंग, पिकनिक असं छान आयुष्य चाललं होतं.

अधूनमधून मी दिल्लीला घरी जात असे. दोन्ही मुलांसाठी भरपूर खाऊ, खेळणी घेऊन जायचो. शोभासाठीही साड्या, दागिने, तिच्या आवडीच्या गोष्टी नेत होतो. बघता बघता दोन वर्षं झाली. आता शोभा बदली घेण्यासाठी फारच जीव खात होती. इकडे रचना आमच्या संबंधांना काही तरी नाव, नात्याचा दर्जा मिळावा म्हणून गळ घालत होती. अन् मी या दोन बायकांना सांभाळू शकत नव्हतो.

रचनानं जे मला दिलं ते शोभाकडून कधीच मिळालं नव्हतं. पण शोभा माझा कायदेशीर पत्नी होती. त्या नात्याला असणारा सामाजिक सन्मान, नैतिक आधार अन् माझी मुलं हे सर्व रचना मला देऊ शकत नव्हती. शेवटी मी बदलीसाठी विनंती पत्र पाठवलं.

‘‘तुम्ही दिल्लीला जाताय?’’

मी रचनाला पत्ता लागू दिला नव्हता, पण तिला कळलंच.

‘‘हो…जावं लागणारच ना?’’

‘‘मला सांगावं असंही वाटलं नाही?’’

‘‘हे बघ रचना, हे नातं आता आपण संपवूयात.’’

‘‘पण तुम्ही तर माद्ब्रयावर प्रेम करत होता?’’

‘‘हो, करत होतो, आता नाही करत?’’

‘‘आता नाही करत?’’

‘‘तेव्हा मला भान नव्हतं, आता मी भानात आहे.’’

‘‘पण तुम्ही शोभाला घटस्फोट देणार होता, माझायाशी लग्न करणार होता…मग? आता काय झालं?’’

‘‘वेडी आहेस तू? दोन दोन बायका कशा करणार मी? अन् शोभाचा दोष काय? काय म्हणून मी घटस्फोट मागणार?’’

‘‘पण आता मी काय करू? कशी जगू? कुठं जाऊ?’’

‘‘उगीच तमाशे करू नकोस. मी तुझ्यावर बळजबरी केली नाहीए. जे घडत होतं, ते तुझ्या इच्छेनंच घडत होतं.’’

‘‘ठिक आहे. तुम्ही मला सोडण्याचा निर्णय घेतलाय. तेही बरोबरच आहे. पत्नी, मुलं, यांचा तुमच्यावर हक्क आहे. वाईट एवढंच वाटतं की स्पष्ट सांगायचं धाडस नाहीए तुमच्यात. मला कळलं नसतं तर कदाचित तुम्ही मला न सांगताही निघून गेला असता पण ज्या प्रेमाच्या गोष्टी बोलत होतात, त्या प्रेमाला एवढीही अपेक्षा नसावी?’’

‘‘तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस.’’

‘‘केवढा दांभिकपणा! मला वापरून घेतलंत अन् आता चक्क फेकून देताहात?’’

‘‘हो, हो! वापरलं तुला. काय करून घेशील? अन् तुला ही सुख मिळालंच ना? पुरेपूर पैसे दिलेत मी. किती खर्च केलाय ते विसरलीस का?’’

मी खरंतर फारच खालच्या पातळीवर उतरलो होतो. रचनानं मला कधीच तिच्यासाठी किंवा मुलांसाठी खर्च करू दिला नव्हता. उलट मीच तिच्याकडे जेवत होतो. चहा फराळ करत होतो. तिच्या एकटेपणाला सोबत करण्याचा मोठेपणा मिरवत होतो.

‘‘तुम्ही अन् तुमच्यासारख्या पुरूषांनी असहाय, एकटया स्त्रीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुम्हाला धडा शिकवणार आहे. मला स्वत:चीच लाज वाटतेय, इतक्या हीन, हलकट माणासावर मी प्रेम केलं…देह अन् मन समर्पित केलं.’’

‘‘रचनानं माझ्यावर बलात्काराची केस ठोकली. ही बातमी कळताच माझ्या घरचे लोक, शोभा अन् तिच्या माहरेची मंडळी सगळीच मुजफ्फरनगरला आली. मी अक्षरश: रडून रडून शोभाची क्षमा मागितली.

‘‘मला एकच सांगा, जर तुम्ही तिथं नसताना, माझे एखाद्या पुरूषाशी असे संबंध झाले असते अन् मी तुमची क्षमा मागितली असती तर तुम्ही क्षमा केली असती?’’

मी काही बोलूच शकलो नाही.

‘‘उत्तर द्या विनय, गप्प बसू नका,’’ शोभा म्हणाली.

‘‘न…नाही…बहुधा.’’

‘‘बहुधा…अं? तुम्ही नक्कीच मला क्षमा केली नसती. पुरूष अनैतिक वागला तर स्त्रीनं त्याला क्षमा करावी असं समाजाला वाटतं. पण चुकून कुणा स्त्रीकडून असं घडलं तर लगेच तिला बदफैली, व्यभिचारी ठरवून समाज मोकळा होतो. खरंच, मला रचनाचा राग येत नाहीए, तिरस्कार वाटत नाहीए, मला तिचं कौतुक वाटतंय अन् दयाही येतेय. तिला केवढ्या मानहानीला सामोरं जावं लागतंय म्हणून दया येतेय अन् तिनं दांभिक पुरूषी अहंकाराला आव्हान दिलंय म्हणून कौतुक वाटतंय.’’

मी घायकुतीला आलो, ‘‘तू मला क्षमा करणार नाहीस.’’

‘‘मी तिच्यासारखी धाडसी नाहीए. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मुलांची आई म्हणून क्षमा करते आहे. एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून क्षमा करणार नाही. तुम्ही कायम अपराधीच राहाल.’’

सगळ्या आळीतले लोक रचनालाच दोष देत होते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या सर्वगुण संपन्न असण्यावर जळणाऱ्या बायका अन् ज्यांना तिनं कटाक्षानं दूर ठेवलं होतं ते पुरूष अशावेळी मागे कसे राहणार? एकटी, देखणी विधवा स्त्री…तिला कोण आधार देणार?

रचना कोर्टात केस हरली. मी माझे सगळे सोर्सेस वापरून उत्तम वकील दिला. पाण्यासारखा पैसा खर्च केला. माझी समाजात पत होती अन् सामाजिक पाठिंबा होता.

रचनाला कुणाचाच आधार नव्हता. आता तिला तिथे राहणंही शक्य नव्हतं. मुलांनाही फार त्रास झाला होता. तिनं एका रात्रीत शहर सोडलं. त्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती.

‘‘माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला मिळाली आहे. माझ्या मुलांना मात्र विनाकारण त्रास झाला. पण मी त्यांना खूप शिकवेन, मोठं करेन. त्यांना मानानं जगता येईल एवढं मी नक्कीच करेन. पण एकच सांगते, तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका. कुणा भोळ्याभाबड्या जिवाचा विश्वासघात करू नका, मुलांनाही करू देऊ नका.’’

ती निघून गेली…मीही दिल्लीला आलो. नव्यानं संसार, नोकरी एकूणच सगळं आयुष्य सुरू झालं. पण माझ्या अन् शोभात जो दुरावा निर्माण झाला होता, तो कधीच भरून आला नाही. तिनं म्हटलंच होतं, एक स्त्री, एक पत्नी, एक बदफैली पुरूषाला चारित्र्यहिन नवऱ्याला क्षमा करणार नव्हती. खरं तर मी तरी स्वत:ला कुठं क्षमा करू शकलो होतो? अन् रचनाला तरी कुठं विसरू शकलो होतो?

मी कुठलंच नातं प्रामाणिकपणे निभावलं नव्हतं. माझ्या मुलीच्या बाबतीतही तेच घडतंय का याची मला भीती वाटत होती. माझा भूतकाळ, त्यातील घटना जणू याक्षणी माझ्यापुढे उभ्या राहून खदाखदा हसत होत्या.

मी ताडकन् उठलो…नाही, राशीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही? मी तिच्याशी बोलतो, तिला समजावतो, माझा मुलगी आहे ती, माझं नक्की ऐकेल. तिनं नाही ऐकलं तर मी त्या रमणला जाऊन भेटेन. त्याच्या बायकोला भेटेन. पण खरं तर अशी वेळ येणारच नाही. राशीलाच सांगून काम भागेल.

मी तिच्या खोलीच्या दाराशी पोहोचलो. हळूच बघितलं तर ती तिच्या मित्राशी व्हिडिओ चॅट करत होती. बोलण्यात रमणचं नाव ऐकून मी तिथच थबकलो अन् आडूनच ऐकू लागलो.

‘‘तुझ्यात अन् रमण सरांमध्ये काय चाललंय?’’

‘‘या वयात जे चाललं तेच!’’ जोरात हसून राशीनं म्हटलं.

‘‘तुला ठाऊक आहे ना. ते विवाहित आहेत.’’

‘‘ठाऊक आहे मला.’’

‘‘तरीही तू?’’

‘‘राशी, तुझा मित्र म्हणून सल्ला देतोय, जो माणूस स्वत:च्या पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही, तो कुणाशीही प्रामाणिक राहणार नाही…तुला केव्हाही डच्चू देतील ते…’’

खदाखदा हसली राशी. ‘‘पुरुष मला सोडणार नाही, मीच सोडते पुरूषांना.’’ दंभ होता तिच्या बोलण्यात.

‘‘अरे, आता तो कोंबडा स्वत: मरायला तयार आहे. तर त्यात माझी काय चूक? अं? त्याला बावळ्याला वाटतंय, मी त्याच्या प्रेमात पार बुडाले आहे म्हणून. पण त्या मूर्खाला हे कळतच नाहीए की मी त्याचा वापर करते आहे. त्याला वापरून मी पुढली पायरी गाठणार आहे. ज्या दिवशी तो मी अन् माझा स्वप्नं, माझी महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये येईल, त्याच दिवशी मी त्याच्यावर रेपची केस ठोकेन. तुला ठाऊक आहे, सध्या कोर्टात स्त्रियानांच न्याय मिळतो.’’

माझ्या छातीत जोरदार कळ उठली अन् मी खाली कोसळलो. माझ्या कानात रचनाचे शब्द घुमत होते. ‘‘तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका…’’

पण वारसा मुलांना मिळाला होता…

कितीतरी हृदय

कथा * पूनम पांडे

‘‘कोणीतरी किती खरे सांगितले आहे की, जे नाते निर्माण व्हायचे असते ते जन्माला येतेच. नियतीमागे दडलेले रहस्य कोण समजून घेऊ शकले आहे? ती असा काही खेळ खेळते की, दोन अनोळखी व्यक्तींची एखाद्या वळणावर अगदी सहज भेट घडते.’’

ते दोघेही जवळपास महिनाभरापासून एकमेकांना ओळखत होते. रोज संध्याकाळी आपापल्या घरातून फिरण्यासाठी बाहेर पडत आणि पार्कमध्ये बसून गप्पा मारत.

आजही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसतच एकमेकांना नमस्कार केला.

‘‘काय मग, आज सकाळपासूनच सर्व व्यवस्थित घडले ना?’’

रमाजींनी विचारले असता रमणजींनी होकारार्थी उत्तर दिले.

आणि त्यानंतर दोघांमध्ये त्या विषयाला धरून गप्पा सुरू झाल्या.

रमा त्यांच्यापेक्षा ५ वर्षांनी लहान होत्या. तरीही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून स्वत:चे मत मांडत असत.

रमणजींनी त्यांना सांगितले होते की, ते कुटुंबात खुश नाहीत. कारण सर्व स्वत:चाच विचार करतात. प्रत्येकाचे स्वत:चे असे वेगळे जग आहे आणि ते त्या जगामध्येच रमतात.

रमणजींचा स्वभावच असा होता की, जेव्हा ते गप्पा मारू लागत तेव्हा बाबा-बुवांसारखे बोलत. ते विचारत, रमाजी, ‘‘तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा त्या लगेचच म्हणत, ‘नाही माहीत… नाही,’ जर माहीत आहे असे म्हटले तरी ते न हसता धीरगंभीरपणे स्वत:ला जे वाटत असे तेच बोलत, ‘‘या जगात पुण्याची दोनच फळे आहेत – एक म्हणजे तुम्हाला जे हवे असेल ते न मिळणे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मिळणे.’’

हे ऐकून रमाजी भरपूर हसायच्या. ते पाहून रमणजी आपल्या बोलण्याचा अर्थ अधिक स्पष्ट करीत सांगायचे की, ‘‘देवाच्या चरणी लीन होताच लाखमोलाचे समाधान मिळते. परमात्म्यात रमणाऱ्या मनाला आणि तीर्थक्षेत्री दान करणाऱ्यांना सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्याचे उत्तर मिळतेच.’’

‘‘आणि हो, रमाजी नीट ऐका, हे जे आयुष्य आहे ते कितीही मोठे असले तरी नास्तिक झाल्यास आणि त्या परमात्म्याला विसरल्यास छोटेही होऊ शकते.’’

हे सर्व ऐकल्यावर रमाजी आपले हसणे लपवत विचारायच्या, ‘‘हो का? मग तुमचा आश्रम कुठे आहे, जेथे दीक्षा घेता येईल?’’

हे ऐकल्यावर रमणजी बरेच गंभीर आणि उदास होत. त्यावेळी त्यांचे मन बदलण्यासाठी त्या म्हणत की, ‘‘गुरुजी, जो तुमको हो पसंद वही बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो तो रात कहेंगे…‘‘

वरील गाण्यात नायकाला नायिकेला काय सांगायचे आहे? थोडक्यात भावार्थ सांगा रमणजी…

रमणजी हे ऐकून गोंधळून जात. ते खूप विचार करीत असत, पण त्यांना काय उत्तर द्यायचे तेच समजत नसे.

काही वेळानंतर रमाजी स्वत:हून सांगत, ‘‘रमणजी, या गाण्यात नायक हा नायिकेला सांगत आहे की, ठीक आहे. तू म्हणशील तसे. तुझ्या पुढे कोण डोकेफोड करेल?’’

त्यानंतर दोघेही जोरजोरात हसत.

बऱ्याचदा रमणजी उपदेशाचे डोस देत. ते सांगत, माझ्या मनात दैवी प्रेम ठासून भरले आहे आणि मी तुम्हाला हा सल्ला यासाठी देत नाही की, मी खूप समजूतदार आहे, तर यासाठी देतोय की, मी तुमच्यापेक्षा जास्त चुका केल्या आहेत. शिवाय हा मार्ग निवडल्यामुळेच मला शांतता लाभली आहे.

अशा वेळी रमाजीही एखाद्या पुरोगामी विचारवंताच्या प्रतिनिधी असल्याप्रमाणे सांगत की, ‘‘रमणजी, आपला स्वत:वरचा विश्वास ३ गोष्टींवर आधारित असतो. आपली सारासार विवेकबुद्धी, आपल्यावरील सामाजिक दडपण आणि स्वत:वरील नियंत्रणाचा अभाव.’’

‘‘आता यापैकी मला जी गोष्ट महत्त्वाची वाटत होती ती मी निवडली आहे आणि त्यामुळेच आनंदी आहे. आता ती गोष्ट कोणती,’’ हे समजूतदार व्यक्ती समजून गेली असेल. एवढे सांगूनही रमाजींना नेमके काय सांगायचे आहे, हे रमणजींना समजत नसे.

रमणजींचे असे उपदेशपर बोलणे ऐकून सुरुवातीला रमाजींना असे वाटायचे की, कुठल्यातरी मोठया सनातनी समाजाचे ओझे ते वाहत आहेत. जीवनात खूप काही सहन करावे लागले असेल, त्यामुळे आता निराशेने त्यांना घेरले आहे.

त्यानंतर एके दिवशी रमा यांनी मोकळेपणाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, नेमके प्रकरण काय आहे? रमा त्यांना म्हणाल्या, मी वयाची ६० वर्षे पूर्ण करणार आहे. हो का? मी ६५, असे म्हणून रमणजी हसले.

‘‘मला असे सांगायचे आहे की, माझा मुलगा, सून मला तरुण म्हातारी म्हणतात,’’ असे रमाजींनी हसत सांगितले.

‘‘बरं… बरं…,’’ रमणजींनी मान डोलावत म्हटले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.

‘‘मला हे जाणून घ्यायचे आहे की, तुम्हाला कोण त्रास देत आहे, ज्यामुळे तुम्ही सतत दु:खी असता?’’ रमाजींनी गंभीर होत विचारले.

रमाजींमध्ये खूपच आपुलकी होती. त्या रमणजींसोबत नेहमी आपलेपणाच्या भावनेतूनच बोलत.

हेच कारण होते ज्यामुळे रमणजींनी कुठलाही संकोच न बाळगता त्यांना सर्व काही सांगितले. बस कंडक्टर म्हणून मी सेवानिवृत्त झालो. एकुलत्या एका मुलाला तो ५ वर्षांच्या असल्यापासून एकटयाने सांभाळले. सिगारेट, दारू, सुपारी, पान, तंबाखू यापैकी कसलेच व्यसन कधीही केले नाही.

मागच्या वर्षीच मुलाचे लग्न झाले. आज परिस्थिती अशी आहे की, तो आणि त्याची पत्नी स्वत:च्या संसारात मग्न आहेत. सून एका स्टोअर्सचे काम सांभाळते तर मुलाचे बूट, चपलांचे दुकान आहे. दोघांचे स्वत:चे असे काम आहे आणि ते अगदी व्यवस्थित सुरू आहे.

‘‘बरं, असे आहे तर. आपल्याला कुणीच विचारत नाही, असे तुम्हाला वाटतेय ना?’’ रमाजींनी विचारले.

‘‘आता तर तुम्हीही माझी जास्त विचारपूस करणार नाही, कारण मी बस कंडक्टर होतो, हे तुम्हाला समजले आहे,’’ रमणजी पुन्हा निराश झाले.

त्यांच्या अशा बोलण्यावर रमाजी हसल्या आणि म्हणाल्या, कुठलेच काम छोटे नसते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी निराशेला आमंत्रण देऊ नका. तिच्यामुळे माणूस थकून जातो आणि हाच थकवा तुमची इच्छा नसतानाही अनेक आजारांचा शिरकाव तुमच्या शरीरात सहजपणे करतो.

‘‘तुम्हाला माहीत नाही, पण मीही तुमच्यासारखीच आहे. तरीही अशा प्रकारे आपुलकीने, निर्मळ मनाने वागते की त्यामुळेच माझा मुलगा, सून माझ्यावर खूप प्रेम करतात.’’

‘‘मी वयाच्या २०व्या वर्षी प्रेम विवाह केला होता. वयाच्या २२व्या वर्षी पतीला त्याच्या प्रेयसीकडे सोडून मी माझ्या मुलाला घेऊन ते घर सोडले. त्यानंतर त्या धोकेबाज नवऱ्याच्या आयुष्याचे काय झाले? त्याच्या किती प्रेमिका होत्या? त्याने किती जणींचे आयुष्य खराब केले? या सर्वांचा मी कधीच मागे वळून विचार केला नाही.

‘‘मी आईवडिलांकडे राहू लागले. वयाच्या २२व्या वर्षापासून मुलाच्या संगोपनासह काटकसर करून पैसे जमा करण्यावर मी माझे लक्ष केंद्रित केले.

‘‘माझा मुलगा सरकारी शाळा आणि महाविद्यालयात शिकला. आता तो एक शिक्षक आहे आणि खूपच सुखी आहे.

‘‘हा, तर मी सांगत होते की, माझ्या आईच्या बागेत आंब्याची ५० झाडे आहेत. ५० फणसाची आणि तितकीच जाम आणि आवळयाची झाडे आहेत. मी त्यांची राखण करायची आणि त्या कामसाठी माझे वडील मला दरमहा पैसे द्यायचे.

‘‘माझा मुलगा दहावीत गेला तेव्हा माझ्याकडे २० लाख रुपये जमले होते. माझा भाऊ, वहिनीने मला कधीच कुठे जाऊ दिले नाही.

‘‘माझ्या प्रेमळ, जुळवून घेण्याच्या स्वभावामुळे माझे त्यांच्याशी कधीच भांडण झाले नाही. शिवाय त्यांच्या मुलांना माझ्या मुलाच्या रुपात एक चांगला मार्गदर्शक लाभला होता. काटकसरीमुळे माझ्याकडील जमा केलेले पैसेही वाढतच गेले.’’

‘‘दरम्यान मुलगा नोकरीत कायम झाला आणि त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही येथे या सोसायटीत राहायला आलो. गेल्या वर्षीच माझ्या मुलाचे लग्न झाले.

‘‘साठवलेले पैसे आणि त्यासाठी केलेली काटकसर यामुळेच आज मी करोडपती आहे. तरी अजूनही साधेपणाने राहते. माझी सर्व कामे मी स्वत:च करते आणि कधीच उदासपणे राहत नाही.

‘‘पण तुम्ही छोटयाशा गोष्टींमुळेही उदास होता. इतक्या दिवसांपासून तुमची व्यथा ऐकल्यानंतर मला असे वाटते की, तुमच्यावर खूपच अत्याचार होत आहे. तुम्ही जर असेच सतत दु:खी राहिलात तर लवकरच जगाचा कायमचा निरोप घ्याल.

‘‘तुम्ही काहीही घडले तरी स्वत:ला त्रास करून घेता, ते पाहून मला खूपच वाईट वाटते. हे पहा, मला एक छान कल्पना सुचली आहे…

‘‘तुम्ही एक काम करा… मी काही दिवसांसाठी तुमच्या घरी येते. तेथील वातावरण बदलण्याचा प्रयत्न करते. मी कुठेही गेले तरी तेथे सामंजस्याचे वातावरण निर्माण करते. लग्नानंतरची तब्बल २० वर्षे मी आईच्या घरी दिवस काढले आहेत.

‘‘पण, असे कसे तुम्हाला माझ्या घरी नेऊ..? काहीतरी कारण सांगावे लागेल ना? मी त्यांना काय सांगू?’’ रमणजींनी विचारले.

‘‘अहो, फारच सोपे आहे. मी काय सांगतेय ते नीट ऐका. आज तुम्ही मनगटावर पट्टी बांधून घरी जा. अचानक हात सून्न झाला आहे. कोणीतरी आधार देणारा हवा आहे, जो माझ्या हाताची काळजी घेईल, असे घरच्यांना सांगा.’’

‘‘त्यानंतर मी तुमच्या मित्राची नातेवाईक आहे, म्हातारी आहे, पण प्रामाणिक आहे. माझी काळजी घेईल, असे त्यांना पटवून द्या. तेही विचार करतील की, बरे झाले फुकट कोणीतरी काम करायला मिळाले.’’

‘‘प्रयत्न करून पाहतो,‘‘ रमणजींनी सांगितले आणि जवळच्या मेडिकलमधून हाताला बांधण्यासाठी पट्टी घेतली. त्यानंतर घरी जायच्या गल्लीत वळाले.

रमणजींचे बोलणे घरच्यांना पटले. आठवडाभराची तयारी करून रमाजी त्यांच्या घरी आल्या.

रमाजी येण्यापूर्वी रमनजींच्या मुलगा, सुनेला वाटत होते की, एखादी सर्वसामान्य बाई असेल. प्रत्यक्षात मात्र रमाजींचे आदरणीय, भारदस्त व्यक्तिमत्त्व पाहून दोघांनीही त्यांना वाकून नमस्कार केला.

रमाजींनीही त्यांना अगदी मनापासून आशीर्वाद दिला. त्यांना पहिल्या भेटीतच रमणजींचा मुलगा, सून चांगले वाटले.

असो, प्रत्येकाचे आपले मत असते, असा विचार करून रमाजींनी कुठलाच निष्कर्ष काढला नाही. सर्व काही येणाऱ्या वेळेवर सोडून दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच रमाजींनी घराचा ताबा घेतला. हात खूपच दुखत असल्याचा अभिनय रमणजी चांगल्या प्रकारे करीत होते.

रमाजींना सकाळी लवकर उठायची सवय होती. त्यामुळेच सर्व उठण्याआधीच त्यांची अंघोळ झाली होती. त्यांनी दोनदा चहा घेतला होता. रमणजींनाही दोनदा चहा दिला होता. सोबतच त्यांनी हलवा आणि पोह्याचा नाश्ता बनवून तयार ठेवला होता.

हे पाहून रमनजींच्या मुलगा, सुनेला आश्चर्य वाटले. इतका स्वादिष्ट नाश्ता मिळाल्याने ते खुश झाले. दोघेही कामावर जाताच रमणजी स्वयंपाकघरात रमाजींच्या मदतीसाठी भांडी धुवायला गेले. रमाजी नको म्हणत असतानाही त्यांनी हट्टाने काम केले, कारण त्यांना माहीत होते की, कामवाली बाई ३ दिवस सुट्टीवर आहे. रात्री येताना पावभाजी घेऊन येऊ, असे रमणजींच्या मुलगा, सुनेने सांगितले होते. त्यामुळे रमाजी निश्चिंतपणे इतर कामे करू लागल्या. त्यांनी बटाटयाचे वेफर्स तयार केले. साबुदाण्याचे पापड बनविले आणि झाडाच्या कुंडयांची साफसफाई केली.

एकाच दिवसात रमाजींनी इतकी सर्व कामे केलेली पाहून रमणजींचे कुटुंब आश्चर्यचकित झाले. रात्री सर्वांनी मिळून आंनदाने पावभाजी खाल्ली.

रमणजी आणि रमाजी रोज संध्याकाळी फेरफटका मारायला लांबपर्यंत जात. काही ओळखीच्या लोकांनी त्यांच्याकडे संशयी नजरेने पाहिले, पण त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

अशा प्रकारे आठवडा कधी झाला, हे समजलेदेखील नाही.

रमणजी आणि त्यांच्या मुलगा, सुनेला रमाजींचे खूपच कौतुक वाटत होते. रमाजींनी आणखी काही दिवस रहावे असे मुलगा, सुनेला वाटत होते. ते ऐकून रमणजींचा चेहरा खुलला. त्यांच्या चेहऱ्यावरील उदासपणा दूर कुठेतरी पळून गेला होता. आता मुलगा, सून त्यांच्याशी प्रेमाने बोलू लागले होते. घरातील वातावरण आनंदी झाले होते.

रमाजींचा हेतू साध्य झाला होता. निघताना त्यांना भेट म्हणून काही सिल्कच्या साडया मिळाल्या, कारण त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला होता.

रमाजी तेथून निघाल्या. संध्याकाळी फेरफटका मारायला या, असे निघताना त्यांनी रमणजींना सांगितले. मात्र संध्याकाळी त्या येऊ शकल्या नाहीत.

रमणजींना त्यांनी निरोप पाठवला की, २ दिवसांसाठी त्या सहकुटुंब बाहेर जात आहेत.

रमणजींनी कशीबशी स्वत:च्या मनाची समजूत काढली. त्यानंतर आठवडा उलटला तरी रमाजी आल्या नाहीत. त्यांनी रमणजींच्या एकाही निरोपाला उत्तर दिले नाही.

फोन करणे रमणजींना योग्य वाटत नव्हते. ते मनातल्या मनात विचार करीत होते. महिना उलटला होता. रमणजी वयापेक्षा जास्त म्हातारे दिसू लागले होते. रमाजींनी बनवलेले वेफर्स आणि साबुदाण्याचे पापड खाताना त्यांना असे वाटायचे की, रमाजी येथेच आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.

एका संध्याकाळी निराश होऊन ते फेरफटका मारायला गेले नाहीत. पाहतात तर काय, रमाजी त्यांच्या दरवाजावर उभ्या होत्या. त्यांना आश्चर्य वाटले. तितक्याच त्यांचा मुलगा व सूनही आले. हे पाहून रमणजींना धक्काच बसला. ते ताडकन उठून उभे राहिले.

सुनेने सांगितले की, रमाजी येथे महिनाभर राहतील आणि आम्ही त्यांच्या हाताखालची माणसे बनून राहू.

रमणजींनी कारण विचारले असता सुनेने सांगितले की, तिची छोटी बहीण होम सायन्स शिकत आहे. तिला महाविद्यालयातील अंतिम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका अनुभवी महिलेसोबत रहायचे आहे. आपल्याकडे राहून प्रकल्प पुस्तिका तयार करायची आहे…

‘‘हो का? फारच छान… सूनबाई खूपच चांगला निर्णय,’’ असे बोलताना रमणजींचा चेहरा खुलला होता. पण रमाजींच्या कुटुंबाला याची कल्पना दिलीत ना?

त्यांनी अचानक विचारले. ‘‘त्यांचे कुटुंब नाही म्हणूच शकणार नाही, कारण माझी बहीण आणि रमा मावशी फेसबुकवरील मैत्रिणी आहेत. शिवाय रमाजींच्या कुटुंबाला समाजसेवेची आवड आहे. हो ना, रमा मावशी?

रमणजींच्या सुनेने विचारले. रमाजींनी चांगल्या वागणुकीमुळे आपल्या जीवनात अशी कितीतरी हृदये, कितीतरी मने जिंकली होती.

नवरे सासू

कथा * पौर्णिमा अत्रे

कवितानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. सहा वाजत आलेले बघून ती दचकली. कपिलची ऑफिसातून परतायची वेळ झाली होती. खरं तर त्यांची भिशी पार्टी आटोपली होती, पण अजून गप्पा संपत नव्हत्या. कुणालाच घरी जाण्याची घाई नव्हती.

आपली पर्स उचलून कविता म्हणाली, ‘‘मी निघते, सहा वाजून गेलेत.’’

डोळे वटारून नीलानं म्हटलं, ‘‘तुला कसली एवढी घाई झालीये? नवराबायको दोघंच तर आहात. घरी सासू, नणंद वगैरे कुणीही नाही…माझ्या घरी बघ, मी घरी पोहोचेन तेव्हा सासू संतापानं लाल झालेली दिसेल…अन् मग बंबार्डिंग सुरू करेल. पण त्यासाठी मी माझा आत्ताचा आनंद थोडीच घालवणार आहे.’’

‘‘नाही तर काय? कविता तू इतकी घाई नको करूस. आपण रोज रोज थोडीच भेटतो?’’ अंजलीनं म्हटलं.

‘‘खरंय गं! पण कपिल येतच असतील.’’

‘‘तर काय झालं? नवरा आहे, सासू थोडीच आहे? जाऊयात ना थोड्या वेळानं.’’

कविता बसली खरी, पण सगळं लक्ष कपिलच्या येण्याकडेच लागलेलं. आज     दुपारी नेमकी ती टीव्हीवर येत असलेला एक जुना मराठी सिनेमा बघत बसली. सगळी कामं तशीच राहिली आहेत अन् मग ही भिशी पार्टी…हॉल पसरलेला, बेडरूममध्येही पसारा…

भिशीच्या पार्टीत मजा तर येतेच. खूप दिवसांनी सगळ्या समवयस्क मैत्रिणी भेटतात. छान छान गप्पा, छान छान खाणंपिणं…पण हे सगळे आपलं घर अगदी व्यवस्थित आवरून घराबाहेर पडलं तरच एन्जॉय करता येतं. या क्षणी तिला फक्त घरातला पसारा दिसत होता.

तिला आता तिथं बसवेना. ताडकन् उठली. ‘‘मी निघतेच, मला घरी कामं आहेत,’’ ती म्हणाली.

‘‘अगं, घरी गेल्यावर कर ना? इतकी काय घाई करते आहेस? घरी काय सासू, आजे सासू हातात काठी घेऊन उभ्या आहेत का?’’ वैतागून सीमानं म्हटलं, ‘‘अशी घाबरते आहे, जशी घरी सासवांची फौज आहे.’’

कवितानं फक्त हसून मान डोलावली अन् ती सर्वांना बाय करून तिथून निघाली. घर फार काही लांब नव्हतं. पायीच जाऊयात, सकाळी फिरणंही झालं नाहीए असा विचार करून ती भरभरा चालायला लागली. मैत्रिणींचं बोलणं आठवून तिला हसू येत होतं. सगळ्या म्हणत होत्या, ‘‘घरात सासू, आजेसासू, चुलतसासू, आत्तेसासू, मामेसासू अशा अनेक सासवा असतात कुणाकुणाला, पण नवरे सासू ऐकलीये कधी कुणी? तिला पुन्हा हसायला आलं. तिच्या घरात नवरेसासू आहे. तिचं लग्न झालं, तेव्हा सगळ्या मैत्रिणींना केवढी असूया वाटली होती.’’

‘‘कविता, भाग्यवान आहेस बाई, काय छान छान नवरा पटकावला आहेस,      एकटाच आहे, सासू नाही, सासरे नाहीत, दीर नाही, नणंदा नाहीत, मजेत जगशील सगळं आयुष्य.’’

स्वत: कवितालाही तसंच वाटलं होतं. खूपच आनंदात तिनं कपिलशी लग्न झाल्यावर मुंबईला संसार थाटला होता. कपिल एकटा होता. तिनं ठरवलं होतं की ती त्याच्यावर इतकं प्रेम करेल, इतकं प्रेम करेल की त्याचं सगळं एकटेपण तो विसरेल. ती आणि कपिल… किती सुंदर आयुष्य असेल.

कपिल जेव्हा तीन वर्षांचा होता, तेव्हाच त्याचे आईवडिल वारले होते. तो दिल्लीला मामामामींकडेच वाढला होता. शिक्षण संपलं, नोकरी लागली अन् तो मुंबईत आला. सप्तरंगी स्वप्नं घेऊन कवितानं संसाराला सुरूवात केली अन् तिच्या लक्षात आलं की कपिलला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू जागच्या जागी लागते. स्वच्छ अन् व्यवस्थित लागते. स्वत:च सगळी कामं करणाऱ्या कपिलला गलथानपणा, गचाळपणा, अव्यवस्थितपणा अजिबात खपत नाही. तो लगेच चिडतो.

कवितावर तो खूप प्रेम करायचा. पण सतत तिला सूचनाही द्यायचा. सासूसासरे नसले तरी कपिल तिला सासूसारखाच धारेवर धरायचा. त्यामुळेच तिनं मनातल्या मनात त्याचं नाव ठेवलं होतं नवरे सासू.

कपिलला अधूनमधून ऑफिसच्या टूरवर जावं लागायचं. त्यावेळी तिला एकटेपणा तर वाटायचा. पण मनातून थोडा सुटकेचा आनंदही असायचा…चला, आता तीन चार दिवस तरी तिला कुणी काही म्हणणार नाही. सततच्या सूचनांचा भडिमार असणार नाही. तिच्या मैत्रिणींच्या सासुबाई कुठं गावाला वगैरे गेल्या की त्यांनाही असंच मोकळं वाटत असेल असं तिच्या मनात यायचं. मग ती अगदी मजेत कोणतीही वस्तू कुठंही ठेवायची. कोणंतही काम केव्हाही करायची. म्हणजे ती खूपच गलथान किंवा अव्यवस्थित अथवा आळशी होती असं नाही, पण शेवटी घर आहे. म्यूझियम किंवा हॉटेल नाही. माणसाला तिथं आराम, दिलासा अन् निवांतपणा मिळायला हवा. अगदी प्रत्येक गोष्ट जिवाचा आटापिटा करून जागच्या जागी ठेवायची म्हणजे जरा अतिच नाही का होत? सायंकाळी नीट बघून घेईन की प्रत्येक गोष्ट जागच्या जागी, स्वच्छ आहे ना? तरीही कपिलला कुठं तरी धूळ दिसायची, कुठं तरी डाग दिसायचा, अन् मग तो त्यावरून बोलायचा. गप्प बसणं त्याला ठाऊकच नव्हतं.

तो स्वयंपाकघरात आला की कविताला वाटे साक्षात् सासूबाईच आल्या आहेत. ‘‘हा डबा इथं का ठेवला आहे? फ्रिज इतका गच्च भरलेला का आहे? पाण्याच्या बाटल्या रिकाम्या का? गॅसची शेगडी नीट स्वच्छ केलेली नाही, ओट्याच्या भिंतीवरच्या टाइल्स किती अस्वच्छ दिसताहेत. मोलकरणीला नीट स्वच्छ करायला सांग.’’ असं त्याचं सतत चालायचं.

कधीकधी कविता कपिलला चिडवायला म्हणायची, ‘‘तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही ना, ‘टू इन वन’ आहात म्हणून?’’

‘‘म्हणजे?’’ तो विचारायचा.

‘‘तुम्ही स्वत: आहातच, तुमच्यात माझी सासूही वास करून आहे, ती फक्त मलाच दिसते.’’

यावर कपिल थोडासा ओशाळायचा अन् मग मोकळेपणानं हसून कविताला मिठीत घ्यायचा. तिही मग पुढे काय बोलणार? तिनं लग्नानंतर लगेच ठरवलं होतं की नवरे सासूला कधीही उलटून बोलणार नाही. शब्दांत शब्द वाढवयाचा नाही. भांडणं, वाद घालणं हा तिचा स्वभाव नव्हता. ठीक आहे. तो बोलतो, तर बोलू देत. ऐकून घ्यावं, जमेल तशी स्वत:त सुधारण करावी. नाही जमलं तर ‘सॉरी’ म्हणावं. आत तर लग्नाला २० वर्षं झालीत. एक मुलगी आहे. सुरभी तिचं नाव. मायलेकी मिळून बापाची फिरकी घेत असतात. दोनच पर्याय आहेत. एक तर या नवरे सासूबाई सोबत भांडण करायचं किंवा त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं. ती भांडत नाही. थोडं फार दुर्लक्ष करते, कधी स्वत:च पटकन् त्यानं दाखवलेली त्रुटी दुरूस्त करते किंवा सॉरी म्हणून हसून प्रसंग निभावून नेते.’’

विचारांच्या नादात ती आपल्या घरापर्यंत पोहोचली. त्याचवेळी कपिलही कारमधून उतरला. दोघं एकमेकांकडे बघून हसली. कवितानं मनातच आता पुढे काय संभाषण होईल याचा अंदाज घेतला. ‘‘हा इतका पसारा का झालाय? सारा दिवस काय करतेस तू? सुरभीचा हा चार्जर अजून इथंच लोळतोय…वेळेवर तो जागच्या जागी का गेला नाही?’’ वगैरे वगैरे वगैरे.

ती अन् कपिल लिफ्टनं सोबतच वर आली. ती लॅचला किल्ली लावत होती, तेवढ्यात कपिलनं म्हटलं, ‘‘कविता, उद्या काम करणाऱ्या बाईकडून दरवाजा नीट पुसून घे बरं. केवढी धूळ साठलीय बघ.’’

‘‘बरं,’’ कवितानं हसून मान्य केलं. मनातल्या मनात ती स्वत:ला सावध करत म्हणाली, ‘‘कविता, तुझी नवरे सासू आली हं! सांभाळून राहा.’’

भरलं घर की राजाराणीचा संसार

कथा * पौर्णिमा अत्रे

‘‘हे स्थळ मला सर्वार्थानं योग्य वाटतंय. एकदा तनूला विचारून घेतो अन् मग फायनल करून टाकू,’’ गिरीशनं आपल्या बायकोला, सुधाला म्हटलं.

‘‘हो, पण तिनं आधी होकार तर द्यायला हवा ना? त्रस्त झालेय या मुलीपायी. इतकी छान छान स्थळं येताहेत पण काही तरी खुसपट काढून नाकारतेय ती सगळ्यांना. त्यातून एकत्र कुटुंब म्हटलं की संतापतेच! आता मात्र मी तिचं अजिबात ऐकून घेणार नाही. आता खरं म्हणजे हे स्थळ तिच्या अपेक्षेनुरूपच आहे, पण एकच डोक्यात घेऊन बसलीय की एकत्र कुटुंबात सून म्हणून जाणार नाही…काही तरी एकेक खुळं या मुलींची!’’ सुधानं म्हटलं.

तुला माहीत आहे ना, हे सगळं त्या तिच्या लाडक्या मैत्रिणीमुळे झालंय. अशी पूर्वी नव्हती आपली तनु, पण हल्ली त्यांच्यावर आई वडिलांपेक्षा मित्र मैत्रिणींचाच प्रभाव जास्त असतो.

नवरा बायको सचिंत चेहऱ्यानं बोलत असतानाच तनु ऑफिसातून घरी परतली. आईवडिलांचे चेहरे बघून तिनं हसून विचारलं, ‘‘आज पुन्हा एखादं स्थळ आलेलं दिसतंय?’’

तिचा हसरा चेहरा अन् विचारण्याची पद्धत यामुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तिघांनी एकत्र बसून चहा घेतला. मग सुधानं म्हटलं, ‘‘हे स्थळ खरंच छान आहे. इथं लखनौमध्येच मुलाचे आईवडिल त्यांच्या थोरल्या लेकसुनेसह राहताहेत. धाकटा मुंबईला असतो. तो एका औषधांच्या कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर आहे.’’

तनुनं क्षणभर विचार केला. मग हसून म्हणाली, ‘‘म्हणजे, तो तिथं एकटा राहतो?’’

‘‘होय.’’

‘‘तर मग हरकत नाही…फक्त त्याच्या आईवडिलांनी वारंवार मुंबईला येऊन धडकू नये…’’

‘‘कसं गं बोलतेस तनु? अगं त्याचे आईवडिल आहेत. ते काय आपल्या मुलाकडे येऊन राहू शकत नाहीत? अशी, इतकी तुसडी अन् माणूसघाणी कशी गं झालीस तू? हे काय नवीनच फॅड तुझं? आम्हाला आजही वाटतं, घरात कुणी वडिलधारं असावं…पण सगळेच खूष आणि निवर्तले अन् तुला घरात फक्त नवरा हवाय…अगं सासरच्या घरात किती तरी नाती असतात. नातलग असतात…ते ही सगळं महत्त्वाचंच असतं…’’ जरा चिडूनच सुधानं म्हटलं.

‘‘नाही…नाही आई, मला भीती वाटते…रिया सांगत होती.’’

सुधा तडकन् उठून उभी राहिली. संतापून म्हणाली, ‘‘नाव नको घेऊस तिचं, आचरट पोरगी…त्या पोरीमुळे आमची चांगली गुणाची पोर बिघडली आहे. बुद्धीभेद केलाय तिनं तुझा. अगं, आपलं फक्त तीन माणसांचं कुटुंब. तुला तर भरल्या घराची, मोठ्या कुटुंबाची किती हौस होती. पण या रियानं निगेटिव्ह गोष्टी सांगून तुझं डोकं बिघडवलंय.’’

तनुला पण राग आला. ती ही रागाने धुमसत आपल्या खोलीत निघून गेली. गिरीश अन् सुधा प्रश्नार्थक मुद्रेनं एकमेकांकडे बघत होती.

तनूची पक्की मैत्रीण रियाचं लग्न सहा महिन्यांपूर्वी दिल्लीतल्याच एका कुटुंबात झालं होतं. घरी सासूसासरे अन् नवरा अनुज अशी मंडळी होती. एक मोठा दिर वेगळा राहत होता अन् नणंदेचं लग्नही वर्षभरापूर्वीच झालं होतं. चांगलं नामांकित, समृद्ध कुटुंब होतं. रियाही नोकरी करत होती. तनुकडूनच रियाची बातमी सुधाला कळायची. दिवसा दोघी व्हॉटसअॅपवर चॅटिंग करायच्या. सुट्टीच्या दिवशी एकमेकींशी भरपूर गप्पा व्हायच्या. जे काही बोलणं कानांवर पडायचं त्यावरून सुधाला एवढं जाणवलं होतं की रिया सतत सासूसासरे अन् नवऱ्याबद्दल तक्रारी सांगत असते. ती तनुची लाडकी मैत्रीण होती. तिच्याबद्दल काहीही म्हटलेलं तनुला आवडत नसे. पण तनु आईला मात्र सगळं सांगायची. त्यामुळेही सुधाला रियाबद्दल बरंच काही कळत असे.

एकदा तनुनं म्हटलं, ‘‘आज सकाळी रियाला जास्त वेळ झोपायचं होतं, पण नवऱ्यानं तिला रोजच्याप्रमाणे लवकर उठवलं. ती दोघं मॉर्निंगवॉकला एकत्रच जातात ना? पण बिच्चारी रिया, तिला मनाप्रमाणे झोपायलाही मिळत नाही. आज रियाचा मूड त्यामुळेच फारच वाईट आहे.’’

एकदा पुन्हा तनूनं सांगितलं, ‘‘रियाची सासू खूपच हेल्थकाँशस आहे. घरातल्या सर्वांच्या तब्येती त्यांच्यामुळेच चांगल्या आहेत. पण त्यामुळे रियाला रोजच ‘हेल्दी फूड’ खावं लागतं.’’

सुधानं विचारलं, ‘‘स्वयंपाक, ऑफिसचे, शाळेचे डबे सगळं सासूबाईच करतात का?’’

‘‘हो ना, रियाला जॉबवर जावं लागतं. सगळं घर त्याच सांभाळतात. स्वयंपाकाला बाई आहे, पण सासू सगळं स्वत:च्या देखरेखीखाली करवून घेतात.’’

‘‘मग हे तर खूपच छान आहे. आयता डबा मिळतो रियाला. यात तक्रार कशाला करायची? रियानं तर आनंदातच राहायला हवं.’’

‘‘कसली डोंबलाची आनंदात राहणार? तिला ते जेवण मुळीच आवडत नाही. ती तिच्या मैत्रीणीला आपला डबा देते अन् स्वत:साठी हॉटेलमधून लंच मागवते. बिच्चारी रिया…!’’

‘‘बिच्चारी…कशानं झाली? चांगला आयता घरच्या चांगल्या जेवणाचा डबा मिळतोय तर हॉटेलचं महागडं अन्  कुणीतरी केलेलं, कसलंतरी जेवण कशला मागवायचं?’’

तनूला राग आला, ‘‘तुला रियाची बाजू समजून का घेता येत नाही?’’

‘‘काही गरज नाहीए. काहीतरी खुसपटं काढून स्वत:चं अन् तुझं डोकं बिथरवून टाकतेय ती.’’

दोन दिवस तनू गप्प होती. मग पुन्हा तिचं सुरू झालं. ‘‘रियाच्या सासरची सगळीच माणसं दिल्लीला असतात. कुणा ना कुणाकडे सतत काही ना काही होतंच असतं. दीर, नणंदा, आत्या, काका, मावशी, मामा…कोण न् कोण सतत ते तिच्या घरी येतात नाही तर तर हिला तरी त्यांच्या घरी बोलावतात. रिया बिच्चारी कंटाळून जाते.’’

सुधाला कळतंच नव्हतं, रियाला त्रास काय होता. तिची नोकरी तशी आरामाची होती. शनिवार रविवार सुट्टी असायची. घरात अगदी कपाटं आवरून देण्यापासून सगळ्या कामांना गडी मोलकरीण होत्या. जायला यायला शोफर सकट गाड्या होत्या. तरीही तिला सगळ्याचा त्रासच व्हायचा. तनूची विचारसरणी बदलते आहे अन् ती रियाची नकारात्मक वृत्ती स्वीकारते आहे एवढंच सुधाला कळत होतं, खटकत होतं.

काही दिवस मध्ये गेले मग रजतचं स्थळ नक्की केलं गेलं. तनू आणि रजत भेटले. दोघांनी मोकळेपणानं गप्पा मारल्या अन् मग दोघांच्या पसंतीनुसार लग्न ठरलं. साखरपुडा वेगळ्यानं न करता लग्नच करणं जास्त सोयिस्कर होतं. कारण रजत मुंबईला एकटाच राहत होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना लग्नाची घाई होती.

लग्न थाटात पार पडलं. रिया नवऱ्याबरोबर लग्नाला आली होती. परत जाताना म्हणाली, ‘‘तनू तुझी मजाच मजा आहे गं! मुंबईला एकटी राहशील…मी तर भरल्या घरात अशी अडकले आहे ना?’’

सुधाला रियाचा राग आला. पण तो न दाखवता तिनं आहेर देऊन रियाला व अनुजला निरोप दिला. तनूनं लग्न ठरताच मुंबईला बदली व्हावी म्हणून अर्ज केला होता. तो मंजूर झाला आणि तिला मुंबईला बदलीही मिळाली. रजतची सुट्टी होती तेवढे दिवस तनू सासरच्या घरीच होती. थोरला दीर, जाऊ, त्यांची दोन मुलं, सासू सासरे सगळ्यांच्या संगतीत वेळ खूप छान गेला. भटकणं, हास्यविनोद, मनसोक्त खाणंपिणं अन् भरभरून प्रेम आणि कौतुक करणारी सासरची माणसं यांच्यात वेळ कसा गेला कळलंच नाही.

दोघांचीही रजा संपली तशी बॅगा भरल्या गेल्या. दोन्ही घरातली मंडळी निरोप द्यायला एयरपोर्टवर गेली होती. रियाही भेटायला आली होती. तनूला बाजूला घेऊन म्हणाली, ‘‘उगीच सर्वांना मुंबईला या, मुंबईला या म्हणू नकोस. येतील सगळेच्या सगळे अन् तुझ्याकडे मुक्काम ठोकतील.’’ तनूनं फक्त हसून विषय टाळला.

मुंबईला रजतबरोबर तनूचा नवा संसार सूरू झाला. रजतबरोबर ती अगदी मजेत होती. दोघंही सकाळी कामावर जायची ती रात्रीच घरी परतायची. वीकएन्डला थोडा निवांतपणा असायचा.

सकाळी लताबाई यायची अन् स्वयंपाकासकट सर्व आटोपून जायची. तनूही डबे करून घ्यायची. घर नीट आहे ना खात्री करून लॉक करून निघायची. तसं दोघांचं काम असं फारसं नसे. पण दमून आल्यावर नाश्ता रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा यायचा

रजतनं अनेकदा म्हटलं, ‘‘रात्रीच्या स्वयंपाकालाही बाई ठेवून घेऊयात.’’

‘‘पण आपली यायची वेळही रोजची ठरलेली नसते. बाईला किल्ली देऊन ठेवायला मला आवडत नाही.’’

‘‘ठीक आहे. रात्रीचा स्वयंपाक आपण दोघं मिळून करत जाऊ,’’ रजतनं सुचवलं. रियाशी रोजच तनुचं चॅटिंग चालायचं. तनुच्या स्वातंत्र्याचा रियाला हेवा वाटायचा. ती सतत आपल्या एकत्र कुटुंबाला नावं ठेवायची. लग्नाला सहा महिने झाले होते. रजतला ऑफिसकडून एक आठवडा सिंगापूरला ट्रेनिंगसाठी जायला लागणार होतं. त्यानं म्हटलं, ‘‘मी इथं नसताना तू एकटी पडशील, लखनैहून आईबाबांना बोलावून घेऊ का? नाही तरी अजून इथं आलेच नाहीएत ती दोघं.’’

‘‘आत्ता नको, आत्ता रियाला इथं येण्याची फार इच्छा आहे. तिला यावेळी येऊन जाऊ दे. पुढल्या वेळी आईबाबांना बोलावून घेऊ. चालेल?’’ तनूनं म्हटलं. रजतला काहीच हरकत नव्हती.

तनूनं लगेच रियाला फोन केला, ‘‘प्रोग्रॅम नक्की ठरला आहे. आता बदल करू नकोस. कुठलीही सबब सांगू नकोस.’’

‘‘नक्की येतेय…या गर्दीतून बाहेर पडायला आसुरलेले आहे मी. अगदी शांत, निवांत राहायचं आहे मला तुझ्याकडे.’’

ज्यादिवशी सकाळी रजत गेला त्याच दिवशी दुपारपर्यंत रियाही मुंबईत पोहोचली. एकमेकींच्या गळ्यात पडून दोघींनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या गप्पा अखंड सुरू होत्या. रात्री उशीरापर्यंत रिया बोलतच असायची. सासूसासरे, दिर नणंदा सगळ्यांबद्दल सांगायची. एकत्र होणारे सणवार, उत्सव, गेट टूगेदर काय अन् काय. दुसऱ्या दिवशी तनूनं रजा घेतली होती. सकाळपासूनच दोघी भटकायला बाहेर पडल्या. भरपूर फिरल्या. सिनेमा बघितला, शॉपिंग झालं. बाहेरचं खादाडी केली. रात्री उशीरा घरी परतल्या.

‘‘वॉव! असं वाटतंय दुसऱ्या जगात आलेय मी…! किती शांत अन् छान वाटतंय गं तुझ्या घरात. व्वा! खूपच मज्जा आली हं!’’ रिया म्हणाली.

तनू फक्त हसली…‘‘दमलोय आपण, आता झोपूयात. उद्या मला कामावर जायला लागेल. सकाळी लताबाई येईल अन् सगळं काम करून जाईल. तू आरामात ऊठ. लताबाई तुझ्यासाठी ब्रेकफास्ट अन् जेवणही करून ठेवेल.’’

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सर्व आवरून तनु ऑफिसला निघून गेली. बारा वाजता रियाचा फोन आला. ‘‘तनू अगं, काय सांगू, इतकी मज्जा येतेय, इतक्यात झोपून उठलेय. किती शांती आहे गं तुझ्या घरात, कुठला आवाज नाही, कुणी माणूस नाही…वॉव!’’

सुधाला, रिया मुंबईला आठ दिवसांसाठी आली आहे हे तनुकडूनच समजलं होतं, तिनं तनुला म्हटलं, ‘‘बघ, रियाच्या सासरची माणसं किती चांगली आहेत. आठ दिवस सुनेला पाठवून दिलीय मैत्रीणीकडे…रियाला चांगल्या माणसांची किंमत नाहीए.’’

रियानं आरामात उठून आवरलं. ब्रेकफास्ट घेतला. थोडावेळ टीव्ही बघितला. काही वेळ बाल्कनीत बसून रस्त्यावरच्या रहदारीची गंमत बघितली. मग मजेत अंघोळ ओटापून, जेवण करून पुन्हा मस्त ताणून दिली. सायंकाळी तनू घरी आल्यावर दोघींनी चहा घेतला, गप्पा चालूच होत्या. रिया म्हणाली, ‘‘तू सांग ना तुझं काही…मीच एकटी माझं सांगतेय.’’

‘‘माझेयाकडे सांगायला काहीच नाहीए, काय सांगू? आम्ही दोघंच ना इथे. सकाळी जातो ते रात्रीच येतो. आठवडा असा धावपळीत संपतो. त्यातल्या त्यात वीकएन्डला जरा आराम मिळतो. घरी बोलायलाही कुणी तिसरं माणूस नाहीए.’’

‘‘हो गं! पण किती शांतता आहे इथं. तिथं घरातून निघताना सासूबाईंच्या सूचना अन् घरात शिरताच त्यांचं चहा घेतेस ना? तुझ्या आवडीची थालपिठं केली आहेत. असं काही बाही बोलायला लागतात. मला तर दमायला झालंय माणसांच्या गराड्यात. रोजच काही ना काही चालू असतं.’’

तनुला आज प्रथमच रियाचं बोलणं खटकलं. तिला मनांतून एकाएकी फार उदास वाटलं. तिनं रात्रीचा स्वयंपाक केला. रिया बोलतच होती. मधून मधून तिच्या नवऱ्याचा अन् सासू सासऱ्यांचाही फोन येऊन गेला.

दोघी झोपायला बेडरूममध्ये आल्या. दोघींच्या मनात वेगवेगळे विचार होते. रिया मनांत म्हणत होती, ‘‘किती छान आयुष्य आहे तनुचं. घरात फक्त दोघंच. किती शांतता असते घरात. कुठलेच आवाज नाहीत. उगीचच बांलणं, सल्ले, विचारपूस नाहीए, कुठं जाते, काय खाल्लं, कोणी विचारणार नाही. आपल्या मनात येईल ते करावं…इकडे तनुच्या मनांत येत होतं, रिया म्हणते मज्जा आहे तुझी…एकटीच राहतेस…पण मला तर एकट्यानं राहण्यात काय मज्जा आहे तेच कळत नाही. इथं आमच्या दोघांखेरीज कुणी तिसरं माणूस नाही. सकाळी मेड सर्व्हंट येते मशीनप्रमाणे कामं उरकते अन् निघून जाते. आमची काळजी करणारं, प्रेमानं विचारपूस करणारं कुणीही नाही. माहेरी तीनच माणसं…मला तर केवढी हौस होती भरल्या घराची एकत्र कुटुंबाची. तिथं किती तऱ्हेची नाती मिळतात…सून, जाऊ, मामी, काकी, वहिनी…प्रत्येक नात्याची वीण वेगळी, मजा वेगळी. इथं वीकएन्डला एखादा सिनेमा बघतो, घरी आल्यावर दमलेलो असतो. विचारणांरही कुणी नाही. रियाला काय असं एकटं राहण्यात सुख वाटतं कुणास ठाऊक…दीरनणंदेची थट्टा चेष्टा मस्करी नाही. जावेची प्रेमळ कुरकुर नाही, सासूसासऱ्यांची प्रेमळ देखरेख अन् काळजी नाही…हे काय आयुष्य म्हणायचं?’’

दोघी एकमेकींच्या आयुष्याबद्दल विचार करत होत्या. तनुनं ठरवलं, उद्या सकाळी लखनौला फोन करायचा अन् सासरच्या माणसांना इथं यायचा आग्रह करायचा. तिकडची सगळी माणसं इथं यायला हवीत. आयुष्यात प्रत्येक नात्याचा आनंद उपभोगायला हवा ना? सहजच तिचं लक्ष रियाकडे गेलं. रियानंही त्याचवेळी तिच्याकडे बघितलं. दोघीही हसल्या.

रियानं विचारलं, ‘‘कसला विचार करते आहेस?’’

‘‘तुझ्याबद्दल अन् तू कसला विचार करत होती?’’

‘‘तुझ्याबद्दल विचार करत होते?’’

दोघीही हसल्या, तनुच्या हसण्यात सामावलेलं गूढ रियाला कळणारच नव्हतं.

एक मित्र आहे माझा

कथा * पूनम अहमद

मी बेडरूमच्या खिडकीपाशी उभी राहून बाहेरचा पाऊस बघत होते. अमित अजून अंथरूणातच होते. जागे होते पण मोबाइलवर गर्क होते. मी खिडकीतून हात बाहेर काढून हलवला. नेमकं तेव्हाच त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं.

‘‘कोण आहे?’’ त्यांनी विचारलं.

‘‘मला माहीत नाही…’’ मी उत्तरले.

‘‘तर मग हात कुणाला बघून हलवलास?’’

‘‘मला त्याचं नांव ठाऊक नाही…’’

‘‘रिया, काय बोलतेस हे कळतंय का तुला? ज्याचं नांव माहीत नाही, त्याला बघून हात हलवतेस?’’

मी गप्प बसले. त्यांनीच चेष्टेच्या सुरात विचारलं, ‘‘आहे कोण? स्त्री की पुरूष?’’

‘‘पुरूष…’’

‘‘अरेच्चा? कमालच आहे…अगं, सांग तरी कोण आहे?’’

‘‘मित्र आहे माझा…’’

ताडकन अमित उठले. रविवारी सकाळी इतकी स्फूर्ती? मला कौतुकच वाटलं. मी बोलूनही दाखवलं, ‘‘अरे व्वा? इतक्या चपळाईनं उठलात? काय झालं?’’

‘‘काही नाही, बघायचं होतं कुणाला बघून तू हात हलवंत होतीस ते…सांगत का नाहीस कोण होता तो?’’

एव्हाना अमित थोडे नाराज झाले होते अन् खूपच बैचेनही दिसंत होते. मी त्यांच्या गळयात हात घातले. अगदी प्रामाणिकपणे म्हणाले, ‘‘खरंच सांगत, मला त्याचं नांव ठाऊक नाही. तो काय करतो, कुठला आहे, मला काहीही ठाऊक नाही.’’

‘‘मग त्याला हात का केलास?’’

‘‘तेवढीच ओळख आहे…’’

अमितला काही समजलं नाही. माझे हात गळ्यातून काढत म्हणाले, ‘‘काय बोलतेस काही कळंत नाहीए…ओळख ना पारख…अन् हात हलवला.’’

‘अहो, त्याचं नावं नाही ठाऊक पण ओळख आहे ना?’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘असाच जाता येता दिसतो कधीमधी. एकाच सोसायटीत राहतो…किती तरी लोकांशी हाय, हॅलो होतंच ना? त्या सर्वांची नांवं गावं ठाऊक असायला हवीत असं कुठं लिहिलंय?’’

‘‘ठीक आहे…मी वॉशरूममधून येतो तोवर चहा, नाश्ता काय करतेस ते बघ.’’ अमितनं विषय तिथंच संपवला.

रविवार असल्यानं मुलंही उशीरा उठणार होती. मी सर्वांच्या आवडीचा ब्रेकफास्ट करायला घेतला.

कांदा चिरताना सहज माझी नजर खिडकी बाहेर गेली. तो नेमका बाहेरून काहीतरी पार्सल पॅक करून घेऊन येताना दिसला. आज रविवार…त्याची बायकोही आज आराम करत असणारर. त्याची माझी नजरानजर झाली. तो हसला अन् निघून गेला.

दहा वर्षांपूर्वी आम्ही अंधेरीतल्या या सोसायटीत फ्लॅट घेतला. सुंदर अन् मोठी सोसायटी आहे. बऱ्याच बिल्डिंगा आहेत. आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याचा फ्लॅट आहे. मी तिसऱ्या माळ्यावर राहते. तो पाचव्या. सुरूवातीपासूनच मी त्याला बघतेय. कधी ‘हॅलो’ म्हणायला लागले ते आठवंत नाही पण आजतागायत ते सुरू आहे.

या दहा वर्षांच्या काळातही मला त्याचं नांव नाही कळलेलं. त्यालाही माझं नांव ठाऊक नसेल. खरं तर आमच्यात असं काही नातंही नाहीए की नांवं माहीत असावीत. पण इतक्या वर्षांत एवढं मात्र झालं आहे की आता आम्ही सहज म्हणून नाही तर जाणून बुजून एकमेकांकडे बघतो. त्याचा एकुलता एक मुलगा आता बारा वर्षांचा होतोय. नकळंतच मला त्याचं सगळं रूटीन माहीत झालंय.

माझ्या बेडरूमच्या खिडकीतून त्याची कोणत्या तरी खोलीची खिडकी दिसते. साधारण वर्षभरापूर्वीच तो त्या खिडकीपाश उभा असलेला अवचित दिसला तेव्हा मला कळलं की तो तिथं राहतो. मात्र तो खिडकीपाशी उभा आहे हे जाणवलं की मी तिकडं बघंतही नाही. आपण त्याच्या खिडकीकडे बघावं हे मला पटलंही नाही.

हो,पण एक खरं, तो रस्त्यावरून जाताना आवर्जून माझ्या खिडकीकडे बघंत जातो. जर मी तिथं असले तर आम्ही एकमेकांना हात हलवून अभिवादन करतो. कधीकधी मी सोसायटीच्या बागेत वॉक घ्यायला जाते तेव्हा तो त्याच्या बायको मुलासोबत बागेत आला तर बायकोच्या लक्षात येणार नाही अशा बेतानं हसून हॅलो म्हणतो. मला गंमत वाटते अन् हसायला येतं.

मला त्याचं सगळं रूटीन लक्षात आलंय. सकाळी सात वाजता तो मुलाला शाळेच्या बसवर सोडायला येतो. मग त्याची नजर माझ्या किचनच्या खिडकीवर रेंगाळते. नजरानजर झाली की तो गोड हसतो. साडे नऊला त्याची सुंदर बायको ऑफिसला जाते. दहाच्या सुमाराला तो निघतो. चारपर्यंत परत येतो अन् सोसायटीच्या डेकेअर सेंटरमधून मुलाला घेतो. सातपर्यंत त्याची बायको परत येते.

माझ्या बेडरूम अन् किचनच्या खिडकीतून आमच्या सोसायटीचा मेनरोड दिसतो. घरातले सगळे माझी चेष्टा करतात…अमित आणि मुलं म्हणतात, ‘‘सगळ्यांची बित्तबातमी असते तुला?’’

‘‘ममा, किती मस्त टाइमपास असतो तुझा. तुला घराबाहेर पडावंही लागत नाही. मनोरंजन अन् बातम्या तुला घर बसल्या मिळतात.’’ मुलांची कमेंट असते.

‘‘रिया, माझं आटोपलं आहे…’’ अमितनं हाक दिली.

‘‘हो आलेच,’’ आम्ही दोघं डायनिंग टेबलवर येतोय तोवर मुलंही आलीच. मोठी तनुश्री वीस वर्षांची. धाकटा राहुल १७ वर्षांचा.

रविवारची निवांत सकाळ. मनाजोगता नाश्ता सगळेच प्रसन्न मूडमध्ये होते. तनुनं म्हटलं, ‘‘आज आम्ही सगळे उमाच्या घरी पिक्चर बघणार आहोत. तिची आई आम्हाला लंच देते आहे.’’

‘‘कोण कोण आहेत?’’ मी विचारलं.

‘‘आमचा संपूर्ण ग्रुप आहे. मी, पल्लवी, निशा, टीना, रिद्धी, नीरज, विनय आणि संजय.’’

अमित म्हणाले, ‘‘नीरज, विनयला तर मी ओळखतो पण संजय कोण आहे?’’

‘‘आमचा नवा मित्र.’’

मला चिडवण्यासाठी अमितनं म्हटलं. ‘‘ठीक आहे, पण मुलांनो, तुम्हाला मम्मीचा मित्र ठाऊक आहे का?’’

राहुलनं दचकून विचारलं, ‘‘काय?’’

‘‘हो ना, तुझ्या मम्मीचाही एक मित्र आहे.’’

‘‘पप्पा, उगीच का चिडवताय मम्मीला?’’ तनु गुरगुरली.

‘‘आईचा कसा मित्र असेल?’’ राहुलनं म्हटलं.

अत्यंत भाबडा चेहरा करून अमितनं म्हटलं, ‘‘विचार तिलाच! मी खोटं कशाला बोलू?’’

आमच्या घरातलं वातावरण मोकळं आहे. मुलांशीही आम्ही मित्रत्त्वानं वागतो. एकमेकांची चेष्टामस्करी, एकमेकांची खेचणं असं सतत चालतं. त्यामुळे घरात हास्याची कारंजी सतत उसळंत असतात अन् वातावरण प्रसन्न राहतं.

तनुनं जरा गंभीरपणे विचारलं, ‘‘मम्मा, बाबा खोटं बोलताहेत ना?’’

का कुणास ठाऊक पण मी जरा बैचेन झाले. ‘‘नाही, खोटं तर नाहीए…’’

‘‘मॉम, काय चेष्टा करतेस? कोण आहे? काय नांव?’’

मी हळूच म्हणाले, ‘‘नांव मला नाही माहीत.’’ त्यावर तिघंही मोठ्यांदा हसले.

राहुलनं विचारलं, ‘‘मम्मा, तुझा मित्र राहतो कुठं?’’

‘‘नाही माहीत.’’ नकळंत मी खोटं बोलले. यावर तिघंही इतके हसले, इतके हसले की सांगता सोय नाही. तो समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो हे मी मुद्दामच नाही सांगितलं. अमितचं सगळं लक्ष मग कायम त्या बिल्डिंगकडे असेल. उगाचच स्वत:च्या जिवाला घोर लावून घेतील.

तनु म्हणाली, ‘‘बाबा तुम्ही उगीचच मस्करी करताय हं! मम्मीला तर काहीच ठाऊक नाहीए…मग कुणी तिचा मित्र कसा असेल?’’

‘‘अगं पोरी, तुझी आई त्याची मैत्रीण आहे. म्हणून तर त्याच्या हॅलोला हात हलवून उत्तर देत होती.’’

मी म्हटलं, ‘‘तुम्ही तिघांचे मित्र असू शकतात तर माझा मित्र असायला हरकत का असावी? आज तुमच्या बाबानं मला हात हलवताना बघितलं तेव्हापासून त्यांचा जीव थाऱ्यावर नाहीए. संशय घेताहेत ते…’’

‘‘अगं, पण आम्हाला आमच्या मित्रांची नांव अन् ठावठिकाणा माहीत असतो…’’ तिघं पुन्हा जोरात हसली.

यावर माझ्याकडे उत्तर नव्हतं…मग मी ही त्यांच्या हास्यात सामिल झाले. तेवढ्यात मोलकरीण आली आणि मी तिथून उठून स्वयंपाकघरात आले. तिला घासायची भांडी काढून द्यायला लागले. मुलं अन् अमित त्यांच्या कामाला लागले.

माझे हात कामं उरकंत होते पण मन मात्र विचार करत होतं. मला त्याचं नावं माहीत नाहीए पण त्याला जाता येताना बघणं हा माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. काहीही न सांगता बोलता मला इतकं जाणवलंय की बायकोबरोबर असली तर तो हात हलवंत नाही. फक्त एक स्माइल देतो. मुलाला स्कूलबसमध्ये बसवलं की तो माझ्या किचनकडे नक्कीच बघतो. मला आता त्याच्या कारचा नंबर पाठ झालाय. मी दुरूनही त्याची कार ओळखू शकते.

त्याच्या पार्किंगची जागा मला ठाऊक आहे. खरं तर हे सगळं जरा विचित्र आहे पण हे जे काही ‘जरा’ आहे ना ते मला आवडतं. सार दिवस मला एक एनर्जी मिळते. हे ‘जरा’ कुणाचं नुकसानही करत नाहीए.

माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. हे ‘जरा’ त्या प्रेमात बाधा आणंत नाही…म्हणजे या ‘जरा’मुळे तसा काहीच त्रास किंवा प्रॉब्लेम नाहीए. अमित आणि मुलांच्या बरोबर असताना या ‘जरा’चा अजिबात त्रास नसतो. आमचं आयुष्य मजेत जातंय.

तो फार देखणा आहे असं नाही. अमित खरोखरंच देखणे आहेत. त्याची बायको माझ्यापेक्षा सुंदर आहे तरीही हे जे काही ‘जरा’ आहे ते मला एक आनंद, एक आत्मविश्वास देतं की मला एक मित्र आहे. भलेही मला त्याचं किंवा मला त्याचं नांव माहीत नाही…पण म्हणून काय झालं? जे आहे ते खूप छान आहे…छानच आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें