कोडं

कथा * रश्मि शर्मा

शनिवारी सायंकाळीच मी ऑफिसातून थेट माझ्या माहेरच्या घरी एका रात्रीच्या मुक्कामासाठी आले. सीमाताई अन् भावजी पण दोन दिवसांसाठी आले होते. म्हटलं चला, तेवढीच आई आणि ताईसोबत गप्पा गोष्टी करण्यातली मजा अनुभवता येईल. पण मी पोहोचतेय तिथं, तोवरच रवीचा, माझ्या नवऱ्याचा फोन आला.

मी त्यावेळी वॉशरूममध्ये होते म्हणून फोन आईनंच घेतला.

मी आरामात सोफ्यावर येऊन बसले. चहाचे कप सखूबाईंनी सर्वांच्या हातात दिले अन् मग आई जरा रागानं म्हणाली, ‘‘रवीचा फोन होता. तुझ्या सासूला ताप आलाय म्हणून सांगत होता.’’

मी एकदम तडकलेच. ‘‘इथं येऊन अजून तासभरही झाला नाहीए अन् लगेच बोलावून घेताएत. सासूबाईंना तर माझं एक दिवसाचं स्वातंत्र्यही बघवंत नाही. तापच चढतो त्यांना.’’

‘‘कुणास ठाऊक, खरंच ताप आलाय की उगीचच तुला बोलावून घेण्यासाठी नाटक करताहेत.’’ ताईनं शंका बोलून दाखवली.

‘‘आज सकाळी जेव्हा मी त्यांच्याकडे एक रात्र इथं राहण्याची परवानगी मागितली, तेव्हाच त्यांचा चेहरा बदलला होता, फुगल्याच होत्या…ताई, तुझी मजा आहे बाई! एकटी राहतेस, सासूसासऱ्यांचा काच नाहीए तुला.’’ माझा मूड फारच बिघडला होता.

‘‘तुला या काचातून सुटायचं असेल तर तू तुझ्या सासूला तुझ्या थोरल्या जावेकडे राहायला पाठव ना? हटूनच बैस. सत्याग्रह कर.’’ ताईनं मला सल्ला दिला. माझ्या लग्नानंतर एक महिन्यानंतर आम्ही भेटलो तेव्हा ही तिनं मला हेच सांगितलं होतं.

‘‘माझी मोठी जाऊ महा कजाग अन् जहांबाज आहे. तिच्याकडे जायला सासूबाई राजी नाहीत अन् तिकडं त्यांना पाठवायला त्यांचा धाकटा लेक तयार नाही. तुला ठाऊक आहे का, मागच्या महिन्यात मी सासूबाईंना जावेकडे पाठवण्याचा हट्ट धरला तर यांनी मला चक्क घटस्फोटाची धमकी दिली. ताई, अगं, यांना आईपुढे माझी काहीही व्हॅल्यू नाहीए.’’

‘‘तू त्याच्या घटस्फोटाच्या धमकीला घाबरू नकोस. कारण रवीचं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे तर आम्हाला सर्वांनाच कळंतय, दिसतंय, जाणवतंय. तुझी व्हॅल्यू तर आहेच!’

‘‘सीमा, खरं बोलतेय शिखा, तू फक्त प्रेमानं त्याला वळव. तुझ्या सासूला दोन्ही सुनांकडेल बरोबरीनंच राहायला हवं. अगदी एका सुनेकडेच सारखं राहायचं म्हणजे काय?’’ आईनं ताईच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

मी एक नि:श्वास सोडला. चहाचा कप टीपॉटवर ठेवत मी म्हटलं, ‘‘आई, आता तर मला निघायलाच हवंय!’’

‘‘वेड्यासारखं नको करूस,’’ आई भडकलीच! ‘‘अगं, इतक्या दिवसांनी येते आहेस, रात्रभर राहून जा. तेवढीच विश्रांती!’’

‘‘आई, माझ्या नशिबात विश्रांती नाही. मला परत गेलंच पाहिजे.’’ मी आपली पर्स उचलली.

‘‘शिखा, अगं तू इतकी का घाबरतेस? रवीनं आईला एकदाही, शिखाला परत पाठवा, असं म्हटलं नव्हतं,’’ ताई मला अडवंत, मला समजावंत म्हणाली.

‘‘नको ताई, मी गेले नाही तर यांचा मूड फारच बिघडेल. तुला माहीत आहे ना, किती संतापी आहेत ते?’’

बाबाही बिचारे मला थांब म्हणंत होते. पण कुणाच्या समजावण्याचा काहीही उपयोग नव्हता. तासाभरातच भावजींनी गाडी काढली अन् ताई व ते मला सोडायला घरापर्यंत आले. पण त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी ते घरात आले नाहीत.

मला अचानक आलेली बघून रवी दचकले, ‘‘अगं? तू परत का आलीस? मी तुला बोलावण्यासाठी फोन केला नव्हता…’’ ते म्हणाले पण त्यांच्या डोळ्यातली आनंदाची चमक लपवता आली नाही. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तक्रारीच्या सुरात म्हटलं, ‘‘एक रात्रही आईबाबांकड राहू दिलं नाहीत तुम्ही…एक रात्र तुम्ही तुमच्या आईला सांभाळू शकत नव्हता का?’’

‘‘परत बोलवायचं नव्हतं, तर मग फोन केलातंच का?’’

‘‘स्वीटहार्ट, फोन फक्त तुला सूचना देण्यासाठी केला होता.’’

‘‘ही सूचना उद्या सकाळी दिली असती तरी चाललं असतं ना?’’ मी चिडूनच विचारलं. त्यावर त्यांना काही उत्तर देता आलं नाही.

त्यांना तिथंच सोडून मी माझा मोर्चा सासूबाईंच्या खोलीकडे वळवला.

त्यांच्या खोलीत शिरताच मी एका श्वासात, वरच्या सुरात त्यांना ढीगभर प्रश्न विचारले, ‘‘आई, तुम्हाला एवढा तेवढा ताप आला तर इतकं घाबरून का जाता तुम्ही? समजा आला ताप तर एक रात्र तुमचा लाडका लेक सेवा करू शकत नाही का? मला फोन करून बोलावून घ्यायची काय गरज होती? एक रात्र मी माझ्या माहेरी राहू शकत नाही का?’’

‘‘हे बघ, मी चक्कार शब्दांनं रवीला तुला बोलावून घे असं म्हटलं नव्हतं. या बाबतीत माझ्यावर ओरडायचं नाही. समजलं ना?’’ सासूबाईही आघाडी सांभाळून होत्या.

‘‘यांच्यासाठी आईनं डबा दिलाय. तुम्ही काय खाल?  सकाळी मी मुगाचं वरण…’’

‘‘मला काही वरण फिरण खायची इच्छा नाहीए.’’ त्या रागातच होत्या.

‘‘मग हॉटेलातून छोले भटूरे किंवा वडापाव मागवून देऊ?’’

‘‘सूनबाई, तू उगीच माझं डोकं फिरवू नकोस.’’

‘‘हो ना, डोकं माझंच फिरलंय…तुमच्या आजारपणाबद्दल ऐकून तशीच धावत आले…ज्या बाईपाशी इतक्या जोरानं बोलायची आणि भांडायची एनर्जी आहे, ती आजारी कशी असेल?’’

बोलता बोलता मी त्यांच्या कपाळावर माझा तळवा टेकवला अन् मी दचकले. त्यांना सणसणूनताप भरला होता.

‘‘तू अजून माझा संताप वाढवायला आली आहेस का? सांगून ठेवते, माझ्यावर उपकार केल्याचा आव आणू नकोस.’’

त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी, मघाशीच खोलीत आलेल्या रवींना म्हटलं, ‘‘तुम्ही उभ्या उभ्या बघताय काय? आईंच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवता येत नाहीत का? केवढा ताप आहे त्यांच्या अंगात…’’

रवी एकदम गडबडले, ‘‘ठेवतो…ठेवतो गार पाण्याच्या घड्या…’’ म्हणत ते स्वयंपाक घराकडे धावले.

‘‘मी तुमच्यासाठी छानशी मुगाची खिचडी करते. चव येईल तोंडाला.’’

‘‘मी काहीही खाणार नाही. माझ्यासाठी एवढे कष्ट घेण्याची गरजही नाहीए.’’ त्या अजून रागातच होत्या.

‘‘सूनबाई, कान उघडून नीट ऐकून घे. हे घर माझं आहे…आणि मी इथंच राहणार. तुझ्यानं होत नसतील माझी कामं तर नको करूस…’’ सासूबाई ठसक्यात म्हणाल्या.

‘‘उगीच नको ते बडबडण्यापेक्षा चहा घ्याल का ते सांगा. उगीच माझं डोकं उठवू नका.’’ मी कपाळावर हात मारून बोलले.

‘‘तू माझ्याशी नीट का बोलत नाहीस सूनबाई?’’ आता त्यांनी अगदी शांतपणे विचारलं.

‘‘काय चुकीचं बोलले मी?’’

‘‘तू चहाचं विचारतेस की काठीनं हाणते आहेस?’’

मला हसायला आलं. ‘‘तुम्ही ना जन्मभर माझ्या तक्रारीच करत राहणार,’’ मी हसून स्वयंपाक घराकडे वळले.

स्वयंपाक घरात मी एकीकडे चहाचं आधण ठेवलं. दुसरीकडे मुगाची डाळ, तांदूळ धुवून ठेवले. तेवढ्यात रवीनं पटकन् मला मिठीत घेतलं. भावनाविवश होऊन म्हणाले, ‘‘बरं झालं तू लगेच आलीस. आईचा ताप बघून मी खूप घाबरलो होतो. खरं तर एक रात्रही तुला माहेरी राहू दिलं नाही याबद्दल खूप खूप सॉरी…’’

‘‘मोठे आलात सॉरी म्हणणारे…माझी काळजी कधी करता तुम्ही?’’ मी पटकन् त्यांच्या ओठांवर माझे ओठ ठेवून त्यांचं तोंड बंद केलं.

माझं चुंबन घेत ते म्हणाले ‘‘तू मनाची खूप स्वच्छ आणि प्रेमळ आहेस. तोंडानं मात्र जहर कडू बोलतेस.’’

‘‘सगळं कळतंय मला. तुमच्या आजारी आईची मी सेवा करावी म्हणून माझी खोटी प्रशंसा करताय? काही गरज नाहीए त्याची.’’

‘‘नाही गं! खरंच तू मनाची फार चांगली आहेस.’’

‘‘खरंच?’’

‘‘तर मग प्रयत्न तरी का करताय? जा, आपल्या आईजवळ जाऊन बसा.’’ मी हसत हसत त्यांना स्वयंपाक घराच्या बाहेर ढकळलं.

ते खरं म्हणाले. महिन्याभरापासून माझ्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे मी म्हणजे सासूबाई अन् नवरा दोघांसाठीही एक कोडंच ठरले होते.

सासूबाईंबरोबर आजही मी बोलते तिखटंच. पण त्यांची सर्व कामं मी मनापासून अन् त्यांच्या सोयीनुसार करते. त्यामुळे त्यांची खूप सोय होते अन् समाधानही होतं.

गंमत म्हणजे मी बदलल्यामुळे माझ्या सासूबाईदेखील बदलल्या आहेत. आता त्या त्यांची सुखदु:खं मोकळेपणाने माझ्याशी बोलतात. पूर्वी आमच्यात एक वरवरची आणि खोटी शांतता असायची. पण आता आम्ही एकमेकींशी कडकडून भांडलो तरी मनातून एकमेकींवर प्रेम करतो, एकमेकींची काळजी घेतो अन् खरोखरंच आनंदात असतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमच्या भांडणांमुळे रवींना टेन्शन येत नाही. त्यांचं बी.पी एकदम नॉर्मल असतं. खरं सांगायचं तर नवऱ्याची तब्येत उत्तम राहावी अन् संसार सुखानं चालावा यासाठी मी स्वत:ला बदललं आहे.

‘‘माझ्या आणि सासूबाईंच्या भांडणात मध्ये पडलात तर बघा.’’ मी यांना महिन्यापूर्वीच धमकी दिली होती. आता आमची भांडणं बघत ते स्वत:शीच हसंत असतात.

‘‘बाइलवेडा आहेस, बायकोचा गुलाम, कधी तरी आईची कड घेऊन बोलत जा,’’ सासूबाई मुद्दाम यांना चिडवतात तेव्हा ते अगदी मोकळेपणांनं हसतात.

सासूसासऱ्यांपासून दूर दूर राहणाऱ्या सीमा ताईच्या आयुष्याशी माझ्या आयुष्याशी तुलना करताना पुन्हा माझ्या मनांत थोडे निगेटिव्ह विचार येताहेत. पण सासूबाई बऱ्या झाल्या की मी त्यांच्याशी एकदा कडकडून भांडून घेईन म्हणजे माझं मन मोकळं होईल. त्यांनाही बरं वाटेल. टेन्शन संपलं की आनंदी आनंद.

नजर भेटीचा खेळ

कथा * पूनव आरडे

नजरभेटीचा खेळ, दोन डोळ्यांनी, दुसऱ्या दोन डोळ्यांशी शब्दांशिवाय साधलेला संवाद हा माझ्या मते जगातला सर्वाधिक सुंदर आणि रोमांचक खेळ आहे (निदान सुरूवातीला तरी असंच वाटतं). या खेळातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चार डोळे हा खेळ खेळतात त्यांच्या पलीकडे कुणालाच त्याबद्दल काही शंका येत नाही. मीदेखील सुमारे एक वर्षांपूर्वी हा खेळ सुरू केला होता. इथं मुंबईत जुलै महिन्यात खूप पाऊस पडतो. आमच्या सोसायटीच्या बागेतल्या जॉगिंग ट्रेकवर पाण्यामुळे थोडं शेवाळं साचतं. तिथं पाय घसरण्याची भीति असते. खरं तर मला घराबाहेर म्हणजे सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर जायला अजिबात आवडत नाही. तिथलं ट्रॅफिक, बसचे हॉर्न, लोकांचा गोंगाट मला नको असतो. म्हणूनच कोलाहलापासून दूर सोसायटीच्या बागेत फिरणं हा माझा नित्यक्रम असतो.

हं, तर पावसाल्यातल्याच एका दिवशी मी घरापासून वीसएक मिनिटांच्या अंतरावर असेलल्या दुसऱ्या मोठ्या पार्कात सकाळच्या ब्रिस्क वॉकसाठी जात होते. तिथंच वाटेत तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. अवचितच आम्ही एकमेकांकडे बघितलं. त्या क्षणार्धाच्या नजरभेटीत जे घडायचं, ते घडून चुकलं होतं. मला वाटतं, हा डोळ्यांचाच दोष असावा. कुणाचे डोळे कुणाच्या डोळ्याला भिडले तर मग त्यावर काही उपाय नाहीए अन् मला वाटतं हाच चार डोळ्यांच्या नजरभेटीचा खेळ आहे.

हं! तर, जेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं तेव्हा काहीतरी घडलं. काय घडलं हे सांगणं, त्या क्षणाचं वर्णन करणं, त्या भावनांना शब्दरूप देणं अवघड आहे. पण इतकंच  आठवतं की तो सगळा दिवस फारच मस्त गेला. घरी परतताना वाहनांचे कर्कश्श हॉर्नदेखील जाणवले नाहीत. रस्त्यावरच्या कोलाहलानं वैताग आणला नाही. सकाळी सात वाजता मी हवेत उडंत अगदी आनंदानं गाणं गुणगुणत घरी आले.

२२ वर्षांची माझी मुलगी कोमल आठ वाजता कॉलेजला जाते. नवरा नऊ वाजता ऑफिसला जातो. मी रोजच्याप्रमाणे कोमलला हाक मारून किचनमध्ये शिरले. भराभर सकाळची कामं आवरली. दोघं निघून गेल्यावर सगळा दिवस मला खूप उत्साह वाटत होता. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा वॉकसाठी बाहेर पडले. पुन्हा त्याच जागी तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. आमची नजरानजर झाली. मनात, देहात एक गोड शिरशिरी जाणवून गेली. नकळत उत्साह संचारला…शरीर जणू पिसासारखं हलकं झालं होतं. नंतर पुढल्या तीनचार दिवसात मला अगदी स्पष्टपणे लक्षात आलं की तो माझा वाट बघतो. पुन्हा:पुन्हा वळून तो त्या वळणाकडे बघत असतो जिथून मी त्या रस्त्यावर येणार असते. मी अगदी दुरूनच त्याला पुन्हा:पुन्हा बघताना पकडलं होतं.

नजरभेटीचा हा खेळ खूपच छान सुरू झाला होता. दोघंही खेळाडू उत्सुकतेनं सकाळची वाट बघत असायचे. संडेला मी कधीच सकाळचा वॉक घेत नव्हते. त्या दिवशी माझा ब्रेक असायचा…आज मी संडेला बाहेर पडले तसं दचकून निखिलनं विचारलं, ‘‘अगं, कुठं निघालीस?’’

‘‘फिरायला…’’ मी उत्तरले.

‘‘पण आज तर रविवार आहे?’’

‘‘आता झोप उघडलीच आहे, तर जाऊन येते. तुम्ही अजून पडून रहा…मी आलेच!’’ म्हणत मी सरळ बाहेरचा रस्ता गाठला. बघितलं तर तो तिथं होताच. आज त्याचा मुलगा बरोबर नव्हता. बहुधा झोपला असावा रविवार म्हणून. पण आज तो त्याच्या पत्नीसोबत होता. मुद्दाम लक्षपूर्वक मी त्याच्या पत्नीकडे बघितलं. छान होती ती. सुंदर आणि स्मार्ट. मला आवडली. त्यानं मला बघितलं अन् बायकोची नजर चुकवून तो माझ्याकडे बघून चक्क हसला. प्रथमच हसला अन् माझ्या सकाळी उठून येण्याचं जणू सार्थक झालं.

म्हणजे आमच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी होतं. त्यामुळे माझ्यात खूपच बदल झाला होता. सकाळची वाट बघण्यात माझी सगळी दुपार, सायंकाळ अन् रात्रही संपत होती. दहा दिवसातच मी किती बदलले होते. संपूर्ण दिवस ही एक जाणीव की या वयातही कुणीतरी आपली वाट बघतंय, रोमांचित करायला पुरेशी होती.

हळूहळू एक महिना पूर्ण झाला. या खेळातल्या दोन्ही खेळांडूनी तोंडानं एक शब्दही उच्चारला नव्हता. डोळेच विचारायचे, डोळेच उत्तर द्यायचे.

एक दिवस नवऱ्यानं विचारलंच, ‘‘आजकाल तू सोसायटीच्या बागेत फिरत नाहीस का?’’

‘‘नाही, तिथं बुळबुळीत झालंय, मला घसरायची भीती वाटते.’’

‘‘पण तुला तर बाहेरचा कोलाहल आवडत नाही ना?’’

‘‘पण पाय घसरून पडण्यापेक्षा तो परवडला ना?’’ उत्तर दिलं मी, पण मनातून जरा अपराधीही वाटत होतं. तरीही या खेळात खूपच मजा वाटत होती म्हणून पुन्हा सकाळची वाट बघायला लागले.

आता खरं तर पावसाळा संपला होता, पण अजूनही बाहेरच्याच बागेत जात होते. ऑक्टोबर सुरू झाला होता. चार डोळ्यांच्या भेटीचा खेळ खूपच रोमांचक झाला होता. मला बाहेरचा कोलाहल आणि गर्दी आवडत नसतानाही केवळ त्याला बघण्यासाठी घाईनं बाहेर पडत होते. पूर्वीपेक्षा अधिक व्यवस्थित कपडे घालून, छान क्रीम पावडर लावून, नवीन टीशर्ट्स, नवीन ट्रॅकपॅन्ट्स, स्टायलिश बूट घालून, सेंटचा फवारा मारून, शोल्डरवर केसांची कधी उंच पोनी बांधून तर कधी केस मोकळे सोडून. त्यावेळी मला मी अगदी सोळा वर्षांची तरूणी असल्यासारखं वाटायचं. कसली धावायची मी…खरं तर सकाळचं फिरणं वर्षांनुवर्षं चाललंय. पण इतकी मजा यांपूर्वी कधीच आली नव्हती.

त्याच्या नजरेशी नजर भेटली की किती प्रश्न असायचे. डोळेच प्रश्न विचारत, डोळेच उत्तर देत. कधी सुट्टीच्या दिवशी उशीर झाला किंवा इतर दिवशी काही कारणानं खाडा झाला तर त्याचे डोळे तक्रार करायचे. त्याचं उत्तर मी डोळ्यांनीच, फक्त हसून द्यायची. कधी कधी तो बहुधा मुद्दामच बघत नसे. मग मीच त्याच्याकडे टक लावून बघायचे. मग तोही मनमोकळे हसायचा. खरंच किती मजेदार खेळ होता…थोडा विचित्रही होता…बोलायची गरजच नव्हती. सकाळी एकदा बघितलं की संपूर्ण दिवस मी एका अनामिक आकर्षणात गुरफटलेली असायचे. मला मग कुणाचा, कशाचा रागही येत नसे की विनाकारण चिडचिडही होत नसे. अगदी प्रसन्न मुद्रेनं, शांतपणे मी माझी घरातली कामं आटोपत असे.

निखिलना आश्चर्य वाटत होतं. एक दिवस त्यांनी म्हटलंच, ‘‘आता तर पावसाळाही संपलाय. जॉगिंग ट्रॅकवरचं वाळलेलं शेवाळंही खरबडून टाकलंय, तरीही बाहेरच्या मार्डनमध्ये जाते आहेस?’’

‘‘हो, जास्त मोठा अन् चांगला राऊंड होतो. इतकी वर्षं इथल्या बागेत फिरून फिरून कंटाळाही आलाय, हा बदल आवडलाय मला.’’

‘‘ठिक आहे. तुला आवडतंय तर काहीच हरकत नाही. फिरणं होतंय हेच महत्त्वाचं!’’ निखिलही फिरायला जायचे पण मी आल्यानंतर ते निघायचे.

त्यानंतर माझं कंबरेचं दुखणं उपटलं. मला खूप त्रास होऊ लागला. सकाळी वीस मिनिटं जायला, वीस मिनिटं यायला लागायची. आल्याआल्या दोघांचे लंच बॉक्स तयार करणं, ब्रेकफास्ट तयार करणं यातच मी दमायचे. पूर्वी मी अर्ध्या तासात घरी आलेली असायचे. दहा मिनिटं मला विश्रांतीसाठी मिळायची. डॉक्टरांकडे जाऊन आले. ते म्हणाले, ‘‘फिरण्याचा वेळ थोडा कमी करून बघा.’’ मी एकदम दचकले. बेचैन झाले. माझी दिनचर्या. दिवस रात्रीचा सर्व वेळ सध्या सकाळी त्याच्या भेटीशी जुळलेला होता. त्याला भेटायचं म्हणजे वीस मिनिटं चालत जायचं अन् वीस मिनिटं चालत परत यायचं. माझ्या दुखण्याने मी त्रस्त होते. थकवा यायचा. आता नियमित जाणं होईना. खाडे व्हायला लागले. कारण आल्यावर किचनमधल्या कामासाठीही एक संपूर्ण तास द्यावाच लागायचा. म्हणजे चाळीस मिनिटं व एक तास जर सलग सकाळी काम केलं तर सगळा दिवस माझी कंबर दुखत राही. अरे बापरे! आता काय करू? इतके दिवस एखाद्या षोडशीच्या उत्साहानं अन् आतुरतेनं रोमांचित होणारी मी…आता काय होणार? सगळं संपणार का?

निखिलला आश्चर्यही वाटत होतं. ते थोडे वैतागलेही होते. मला समजावत होते, ‘‘अगं, इतकी वर्षं इथंच वॉक घेत होतीस ना तर आता सकाळचं फिरणं बंद करून संध्याकाळी फिरायला जा. सकाळी कामं जास्त असतात. ती तर टाळता येणार नाहीत. म्हणून आपणच तोडगा काढायचा. सायंकाळी काम कमी असतात. त्यामुळे तुझ्यावर ताण येणार नाही. तब्येतीला थोडा आराम पडेल…’’

डॉक्टरांनीही हेच सांगितलं. पण मला ते पटेना. फारच विचित्र मन:स्थितीत होते मी. शरीराला विश्रांतीची गरज होती. पण मनाला आनंद तो दिसल्यामुळेच मिळायचा. त्याला बघण्यासाठीच मी बाहेरच्या रस्त्यावर, लांबच्या बागेत जात होते. पण आता खाडे फारच होऊ लागले.

त्याचा मुलगा एव्हाना छानपैकी सायकल चालवू लागला असावा. कारण आता तो एकटाच दिसायचा. नजरभेटीचा खेळ चालूच होता. माझ्या तब्येतीची काळजी न करता मी बाहेर जातच होते.

एक जानेवारीच्या सकाळी पहिल्यांदा त्यानं माझ्या जवळून जाताना, ‘हॅप्पी न्यू ईयर’ म्हटलं. मी ही आपली स्पीड करून, ‘‘थँक्स टू यू,’’ म्हटलं. इतक्या दिवसांच्या या आमच्या नजरभेटीच्या खेळात प्रथमच शब्दांचा वापर झाला. मन मयूर आनंदानं थुईथुई नाचायला लागलं.

आता माझी कंबर जास्त दुखत असली तरी मी कोमल आणि निखिलपासून स्वत:चं दुखणं लपवत होते. ती दोघं घराबाहेर पडली की दुखणारी कंबर शेकत सगळा दिवस लोळून काढायचे. कंबरेला बेल्ट बांधून असायचे. पण कितीही लपवलं तरी वेदना चेहऱ्यावर उमटायची. लेकीच्या लक्षात यायाचं. मग ती कधी प्रेमानं, कधी दटावून म्हणायची, ‘‘मॉम, नको त्रास करू घेऊस. डॉक्टरांनी नको म्हटलंय ना? संध्याकाळीच वॉक घेत जा, सकाळचं फिरणं बंद कर.’’

पण मी ऐकत नव्हते. कारण मी जगातल्या सगळ्यात आकर्षक आणि रोमांचक खेळातील खेळाडू होते.

मे महिना सुरू झाला अन् माझ्या जिवाची घालमेल वाढली. मे महिन्यात मी नेहमीच सायंकाळी फिरायला जायची. उन्हाळा, उकाडा मला अजिबात सहन होत नाही. आठ-दहा दिवस कशीबशी मी गेले. मुंबईतल्या चिपचिप्या उन्हाळ्यात सकाळीच इतकी घामाघूम होऊन जायची. पार थकलेली. आल्या आल्या लिंबूपाणी ढसकल्यावर खरं तर जागचं उठू नये असं वाटायचं…पण सकाळची कामं वाट बघत असायची. उठावंच लागायचं.

या उन्हाळ्यानं तर माझ्या मनाचा अगदी अंतच पाहिला. यावेळचा उन्हाळा तर या चार डोळ्यांच्या खेळातला महत्त्वाचा टप्पा होऊन आला. कितीही प्रयत्न केला तरी मी उन्हाळ्यात रोज नियमित फिरायला जाऊ शकले नाही. सुट्टीच्या दिवशी आवर्जून जायचे. कारण घरी परतल्यावर स्वयंपाक घरात शिरण्याची घाई नसे. त्याला बघण्याचा मोह अनावर होता. पण उन्हाळा अन् काहिली त्यावर मात करत होती. घाम पुसता पुसता जीव नकोसा व्हायचा. त्याला बघून आल्यावर ठरवायचे की आता नाही जाणार…उकाडा सहन होत नाही. मी कुणी सोळा वर्षांची तरूणी आहे का जी प्रियकरासाठी वेडीपिशी होते. नवरा आहे, मोठ्या वयाची मुलगी आहे, अरे मी एक संसारी, मॅच्युअर स्त्री आहे. मी कशाला त्याला भेटायला धावत जावं? अन् इतक्या महिन्यांत नेमकं मिळवलं काय? मला काही त्याच्याशी अफेअर करायचं नाहीए की पुढे संबंध वाढवायचे नाहीएत. जे झालं, ते पुरे झालं. ही बाब इतकी महत्त्वाची नाहीए. उन्हाळा वाढत होता. माझी अक्कल ठिकाण्यावर येत होती. सगळा उत्साह, रोमांस, रोमांच…सगळंच संपल्यात जमा होतं. उन्हाळा, कंबरेचं दुखणं आणि घरकाम या त्रयीनं मला या खेळात पराभूत केलं होतं. मनातून अजूनही त्या पार्कात जावंसं वाटायचं पण प्रत्यक्षात ते जमणं शक्य नाही हे ही समजत होतं.

खरं तर मनात, हृदयात खळकन् काही तरी फुटलं होतं. पण मग स्वत:चीच समजूत घातली की ठीक आहे. जीवन आहे…असंच चालायचं…होतं असं कधीकधी. हे वय, ही वेळ, या जबाबदाऱ्या खरं तर या खेळामध्ये नसाव्यात…पण माझ्यावर त्या आहेत. नजरभेटीच्या या खेळात मी आपला पराभव मान्य केला होता. ‘ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गंमतीची’ ही ओळ आता आयुष्यातून मी पुसून टाकली होती अन् पूर्वीप्रमाणेच आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये सायंकाळी फिरायला जायला लागले होते.

लग्नगाठ

कथा * श्री प्रकाश

झारखंडमधल्या ‘बोकारो’ शहरात राहणारा तपन काही कामानं कोलकत्त्याला गेला होता. तिथून परत येण्यासाठी त्यानं बसचं तिकिट काढलं. शेजारच्या सीटवर एक सुंदर तरूणी बसली होती. साधारण पंचविशीची असावी. तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वात एक आकर्षण होतं. दोघंही आपापल्या सीटवर मासिक वाचत बसली होती. बस कोलकत्त्याच्या बाहेर पडल्यावर बसमध्ये अल्पोपहार दिला गेला. दोघांनी आपापली मासिकं बंद करून बाजूला ठेवली अन् ते एकमेकांकडे बघून हसले.

‘‘हॅलो, मी तपन.’’ स्वत:ची ओळख करून देत तपननं म्हटलं.

तिनं हसून म्हटलं, ‘‘मी चित्रा.’’

खाताखाता दोघांनी जुजबी गप्पा मारल्या अन् पुन्हा ती दोघं आपापल्या मासिकात दंग झाली. दुर्गापूरला बसचा थांबा होता. दहा मिनिटं बस थांबणार होती. तपननं खाली उतरून दोन कप चहा आणला. एक कप चित्राला दिला. तिनं  ‘‘धन्यवाद’’ म्हणत चहा घ्यायला सुरूवात केली.

आसनसोल आता जवळ आलं होतं. तेवढ्यात बस थांबली. काही प्रवासी पेंगले होते, काही जागे होते. बस अचानक थांबल्यामुळे पेंगलेले लोकही जागे झाले.

‘‘काय झालं?’’ ‘‘बस का थांबली?’’ वगैरे प्रश्न आपसातच विचारले गेले. कारण कुणालाच ठाऊक नव्हतं. थोड्याच वेळात कंडक्टर माहिती काढून आला, वाटेत एक मोठा अपघात झाल्यामुळे ट्रॅफिक दोन्ही बाजूंनी बंद झालं होतं. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता मोकळा व्हायला बराच वेळ? लागणार होता. तोवर प्रवाशांनी गाडीतच विश्रांती घ्यावी असं त्यानं सांगितलं. काही प्रवाशी खाली उतरले, काही गाडीतच थांबले.

तपनही खाली उतरला. चित्रा मात्र गाडीत बसून होती. ती फार काळजीत वाटत होती. तपननं तिला बसमधून उतरायला लावलं. बाहेर हवा छान होती, पण चित्राच्या चेहऱ्यावर खूपच काळजी दाटून आली होती.. ती थोडी घाबरलेलीही वाटत होती.

तपननं तिला तिच्या काळजीचं कारण विचारलं. ती म्हणाली, ‘‘बोकारोच्या बस स्टॅन्डवर माझे एक दूरचे नातेवाईक मला घ्यायला यायचेत. आता बस कधी तिथं पोहोचेल, सांगता येत नाही. ते रात्रभर काही माझी वाट बघत थांबून राहू शकत नाहीत. काय करू? शिवाय आज रात्री माझं बोकारोला पोहोचणं फारच गरजेचं आहे.’’

‘‘हे संकट अवचितच उद्भवलं आहे. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आधी त्यांना फोन करून बसस्टॅन्डवर जाऊ नका एवढा निरोप द्या. नंतर पुढे काय करता येईल ते बघूयात. ट्रॅफिक मोकळं कधी होईल ते सांगता येत नाही.’’ तपननं सुचवलं.

चित्रानं फोन करून आपल्या नातलगाला तसं कळवलं. पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही ताण होता. तिचे डोळे भरून आले होते. म्हणजे तिचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाला नव्हता.

तपननं विचारलं, ‘‘तुम्ही फारच टेन्शनमध्ये आहात, मला सांगू शकाल का काय कारण आहे ते? आपण सगळेच बोकारोला जाणार आहोत…अन् सगळेच इथं अडकले आहोत…पण काही तरी प्रयत्न करता येईल?’’

काही क्षण ती गप्प होती. मग म्हणाली, ‘‘मला आज रात्री बोकारोला पोहोचणं फारच गरजेचं आहे. उद्या सकाळी एक फारच महत्त्वाचं काम आहे, वेळेवर पोहोचले नाही, तर फार म्हणजे फारच नुकसान होईल.’’

तपननं म्हटलं, ‘‘खरं तर मला काही म्हणायचा अधिकार नाहीए, तरीही जरा स्पष्ट सांगितलंत तर काही तरी सोल्युशन शोधता येईल.’’

काही क्षण विचार करून, स्वत:ला थोडं सावरत तिनं सांगितलं, ‘‘उद्या सकाळी मला कोर्टात हजर व्हायचं आहे. उद्या कोर्टाचा लास्ट वर्किंग डे आहे. त्यानंतर उन्हाळी सुट्टीसाठी कोर्ट दोन महिने बंद राहील.’’

‘‘आज रात्री पोहोचायचं झालं तर मी काही पर्याय बघू का?’’

‘‘काही होत असेल तर बघा ना? मी जन्मभर तुमची ऋणी राहीन.’’

तपननं बस कडक्टरला विचारलं की हा ट्रॅफिक जॅम होण्याचं कारण काय आहे?

तेव्हा त्यांनं सांगितलं पुढे पुलावर एक ट्रक बंद पडलाय. त्यामुळे एखादी स्कूटर सोडली तर कोणतंही चार चाकी वाहन निघूच शकत नाहीए. तपननं त्याला म्हटलं की लवकर बोकारोला पोहोचायचं म्हटलं तर काय पर्याय आहे?’’ कंडक्टरनं म्हटलं, ‘‘तुमच्यापाशी फारसं सामान नसेल तर थोडं पायी चालून पुल क्रॉस करा. पुढे जाऊन एखादी रिक्षा मिळेल, त्यानं टॅक्सी स्टॅन्डवर पोहोचा आणि तिथून टॅक्सी करून बोकारोला जाता येईल. मात्र, या बसच्या भाड्याचे पैसे परत मिळणार नाहीत.’’

‘‘राहू देत, भाडं परत मिळालं नाही तरी चालेल. चांगला सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद!’’

तपन सरळ चित्राजवळ आला, ‘‘चला, पुढे जाण्याचा मार्ग सापडला आहे. तुमच्याजवळ अवजड सामान नाहीए ना?’’

‘‘नाही, ही एवढी हॅन्डबॅग फक्त आहे.’’

दोघं आपलं सामान घेऊन पायी चालू लागले. पूल ओलांडल्यावर थोड्या वेळातच रिक्षास्टॅन्ड लागला. रिक्षा करून ते टॅक्सीस्टॅन्डकडे निघाले. रस्ता फारच वाईट हाता. खूपच हादरे, हिसके बसत होते. त्यामुळे दोघांना एकमेकांच्या शरीराचा स्पर्श होत होता. चित्रा खूपच आवरून, सावरून बसली होती. तपनला मीराची आठवण आली. पाच वर्षांपूर्वी तो त्याच्या पत्नीबरोबर रिक्शातून जाताना असाच तिचा स्पर्श झाला की तो रोमांचित व्हायचा. पण आता मीरा त्याच्या आयुष्यात नव्हती.

टॅक्सीस्टॅन्डवर लगेच बोकारोची टॅक्सी मिळाली. बोकारोला पोहोचायला रात्रीचे दोन वाजले होते.

‘‘तुम्हाला कोणत्या सेक्टरला जायचं आहे?’’ तपननं चित्राला विचारलं.

‘‘मला जायचंय सेक्टर वनला. तिथून कोर्ट जवळ आहे. पण मला त्या नातलगांचा फ्लॅटनंबर लक्षात नाही. माझ्याकडे लिहिलेलाही नाहीए. माझे वडिल एका महत्त्वाच्या टेंडरच्या कामासाठी नेपाळला गेलेत. आईलाही त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्याबरोबर राहावं लागतं. मी एकुलती एक मुलगी आहे. कामच असं आहे की मला एकटीला यावंच लागलं.’’

‘‘आता असं अपरात्री त्यांना शोधणं अशक्य आहे. काही तासांचा प्रश्न आहे, तुम्ही माझ्या घरी चला.’’

‘‘नाही…नको, मी इथंच थांबते, सकाळी त्यांना फोन करते अन् बोलावून घेते.’’

‘‘भलतंच काय? रात्री थांबायला टॅक्सी स्ट्रन्ड ही सुरक्षित जागा नाहीए.’’ तपननं म्हटलं. त्याने फोन लावला. ‘‘हॅलो आई, अजून जागी आहेस? मी घरी येतोय, पंधरा मिनिटात पोहोचतो.’’ त्यानं फोन बंद केला अन् म्हणाला, ‘‘माझी म्हातारी आई अजून जागी आहे. तुम्ही न घाबरता माझ्या घरी चला. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही.’’

चित्रानं संमतीदर्शक मान डोलावली. ती दोघं पोहोचली. तपननं लॅचकीनं दार उघडलं. आईला कमी दिसायचं, कुणा स्त्रीबरोबर तपन आलाय बघितल्याबरोबर तिनं म्हटलं, ‘‘मीराला घेऊन आला आहेस का?’’

‘‘आई, आता मीरा कधीच येणार नाही. मी आलोय. ही चित्रा?’’ त्यानं थोडक्यात सर्व हकीगत सांगून आईला झोपायला पाठवलं.

मग त्यानं चित्राला गेस्ट रूम दाखवली. ‘‘इथं तुम्ही शातंपणे विश्रांती घ्या.’’ तो म्हणाला.

चित्रानं म्हटलं, ‘‘रागावणार नसाल तर एक विचारू?’’

‘‘हं.’’

‘‘मीरा तुमची बायको आहे का?’’

‘‘आहे नाही, होती, आता आमचा डिव्होर्स झालाय.’’ ‘‘सॉरी! पण योगायोग बघा. उद्या कोर्टात माझ्या डिव्होर्सचीच केस आहे. निर्णय झाला आहे. मी अन् चेतन परस्पर सामंजस्यानं घटस्फोट घेतोय.’’

काहीवेळ कुणीच बोललं नाही.

मग तपन म्हणाला, ‘‘खरं तर तम्ही शिक्षित आहात, देखण्या आहात, शांत आणि समंजसही आहात, तुमच्या पतीला तुमचा अभिमान वाटायला हवा.’’

‘‘तसं त्याला वाटत नव्हतं. माझं सासर इथंच आहे, पण आता मी घटस्फोट घेतलाय तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. नवरा कोलकत्त्यालाच एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो. माझं माहेर पाटण्याला आहे. मी सॉफ्टवेयर इंजिनियर आहे. मी अन् माझ्या कॉलेजमधल्या तीन मित्रांनी मिळून एक कंपनी उघडली आहे. स्टार्टअप आहे. सुरूवातीलाच माझ्या नवऱ्याच्या कंपनीच्या गॅरेजमध्ये आम्ही काम सुरू केलं होतं. वर्षभर बरं चाललं होतं. आम्ही एका अमेरिकन कंपनीसाठी प्रॉडक्ट तयार करतो आहोत. रात्री उशीरापर्यंत आम्हाला काम करावं लागायचं. अधूनमधून मी चहा कॉफी करून आणायची. कधी आम्ही चौघं असायचो. कधी तरी मी अन् त्या तिघांपैकी कुणी एक असे दोघंच काम करायचो. कामाचा ताण फार होता. ताण थोडा कमी व्हावा म्हणून मग विनोद सांगणं, थोडं हसणं, गप्पा असंही करत असू. नेमकं हेच चेतनला माझ्या नवऱ्याला खटकत होतं. त्यावरून तो माझ्याशी भांडण करायचा. याचवेळी अमेरिकन कंपनीनं आम्हाला काही फंडही दिला. त्यातून आम्ही शेजारच्याच एका घरात कंपनीचं ऑफिस शिफ्ट केलं. ती जागा भाड्याचीच होती, पण सोयीची होती. काम वेळेत पूर्ण करण्याचंही टेन्शन होतं. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत जागून काम करावं लागायचं. आम्हा चौघांना आमच्या मेहनतीचे पैसेही भरपूर मिळत होते.

पण चेतनला यातलं काहीच कळत नव्हतं. तो समजून घ्यायला तयारच नव्हता. एक दिवस तर त्यानं चक्क व्यभिचाराचा आरोप केला. ‘‘तुला कंपनी बंद करावी लागेल किंवा मला घटस्फोट द्यावा लागेल.’’ त्यानं स्पष्टच म्हटलं. मी त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. ‘‘आम्ही सर्व पार्टनर्स चारित्र्यवान आहोत. आमच्यावर अशी चिखलफेक करू नकोस.’’ हे समजावलं पण त्याचं एकच म्हणणं, ‘‘कामच्या नावाखाली तुम्ही चैन चंगळ करता, ऐयाशी करता वगैरे वगैरे.’’ शेवटी आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला.

एव्हाना पहाटेचे पाच वाजले होते. तपननं चहा करून आणला. ‘‘चहाबरोबर काही खायला लागेल का? ब्रेकफास्ट तयार व्हायला अजून वेळ आहे.’’

‘‘नको, नुसता चहाच हवाय,’’ चित्रानं म्हटलं. दोघांनी चहा घेतला. सकाळी सहा वाजता चित्रानं नातलगांना फोन केला. ते म्हणाले, त्यांची मॉर्निंग ड्यूटी असल्यानं ते फॅक्टरीत पोहोचले आहेत. दुपारी तीन वाजता भेटू शकतात. चित्रानं त्यांना सांगितलं की आताच बोकारोला पोहोचली आहे. आता ती कोर्टातलं काम पूर्ण करून परस्पर कोलकत्त्याला निघून जाईल.

मग तिनं तपनला विचारलं, ‘‘मीरा अन् तुम्ही वेगळे का झालात?’’

‘‘मी इथं प्लांट इंजिनियर आहे. परचेस डिपार्टमेंटला काम असल्यानं खरेदीसाठी, मशीनचे सुटे पार्ट्स वगैरे घ्यायला मला कोलकत्त्यालाच जावं लागतं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. मीराचे वडील श्रीमंत बिझनेसमन आहेत. मीराही याच प्लांटमध्ये अकाउंट ऑफिसला नोकरी करायची. आमची ओळख झाली. मग प्रेम जमलं. लग्नंही झालं. सहा महिने खूप आनंदात गेले. मग तिनं हट्ट धरला वेगळं घर करण्याचा. ती म्हणाली आईला आपण एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवूयात. मी मात्र यासाठी तयार नव्हतो. त्यावरून रोज आमची भांडणं होऊ लागली. तिनं शेवटी अल्टिमेटमच दिलं की आई किंवा बायको, कुणा एकाची निवड कर. मी आईला एकटं कसं सोडणार होतो? ती म्हणाली मग मला मोकळी कर. मी खूप प्रयत्न केला पण ती ऐकतच नव्हती. शेवटी घटस्फोट झालाच.’’ तपननं सांगितलं.

‘‘हल्ली आपल्याकडेही घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूप वाढते आहे. ही गोष्ट चांगली नाहीए. खरं तर मुली शिकतात. हुशारी, कर्तबगारी दाखवतात. त्यांना सासरी, नवऱ्याकडूनही मान, सन्मान मिळायला हवा. त्यांनाही करिअर करायचा हक्क मिळायला हवा. मी बरोबर बोलते आहे ना?’’

‘‘होय ते बरोबर आहे, पण एकुलता एक मुलगा असेल तर त्यानं म्हाताऱ्या आईला वाऱ्यावर सोडून स्वत:चा संसार मांडणं योग्य ठरेल का?’’ तपननं म्हटलं. दोघांनीही एकदमच म्हटलं, ‘‘यावर मध्यम मार्ग शोधला पाहिजे.’’

कोर्टात चेतन चित्राच्या घटस्फोटाला मंजुरी मिळाली. कायदेशीररित्या आता दोघं स्वंतत्र होती. तपन म्हणाला, ‘‘हा असा निर्णय आहे, ज्यावर आनंद व्यक्त करावा की दु:ख व्यक्त करावं तेच समजत नाहीए.’’

तपननं त्या दिवशी रजा टाकली होती. तो चित्राला घेऊन घरी आला. आईनं स्वयंपाक करून ठेवला होता. तिघं जेवायला बसली. आईनं म्हटलं, ‘‘तू तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दल काय निर्णय घेतला आहेस?’’

‘‘मी अजून काहीच निर्णय घेतला नाहीए. सध्या काही महिने मी कंपनीच्या कामात इतकी बुडालेली असेन की मला कुठलाही विचार करायला उसंत मिळणार नाहीए.’’ चित्रानं म्हटलं.

‘‘काळजी करू नकोस. एक रस्ता बंद होतो, तेव्हा दुसरा रस्ता उघडतोच,’’ आई म्हणाली.

तपन चित्राला सोडायला रेल्वे स्टेशनवर गेला. तिचं रिझर्वेशन होतंच, चित्रानं म्हटलं, ‘‘जेव्हा तुम्ही कोलकत्त्याला याल तेव्हा मला भेटा. सध्या सॉल्टलेकच्या फ्लॅमध्येच माझं घर आणि ऑफिस आहे,’’ तिनं तिचं कार्ड तपनला दिलं.

‘‘शुअर!’’ तपननं म्हटलं आणि स्वत:चं कार्ड तिला दिलं.

चित्रा कोलकत्त्याला गेल्यावर दोघांमध्ये टेलिफोनवर संभाषण व्हायचं. दोघं एकमेकांच्या कामाबद्दल, तब्येतीबद्दल बोलायचे, विचारपूस करायचे. आईबद्दल चित्रा आवर्जून विचारायची. कधीतरी तपनची आई तिला विचारायची, ‘‘पोरी, काही निर्णय घेतलाए का?’’ चित्रा म्हणायची, ‘‘अजून मला वेळच कुठं मिळतोय?’’

एकदा आईनं फोन केला अन् चित्राला म्हटलं, ‘‘माझा तपन कसा काय वाटतो तुला?’’

चित्रा गडबडली. या प्रश्नासाठी ती तयारच नव्हती. तरी ती म्हणाली, ‘‘तपन फारच सज्जन अन् परोपकारी वृत्तीचे आहेत.’’

‘‘तपनही तुझं खूप कौतुक करतो. म्हणतो फार हुषार अन् मेहनती मुलगी आहे. खूप प्रगती करेल.’’ आईनं सांगितलं.

‘‘हा तर त्यांचा मोठेपणा आहे.’’ चित्रा संकोचानं म्हणाली.

काही दिवसांनी तपनला कोलकत्त्याला जावं लागलं. तो काम संपवून चित्राला भेटायला गेला. चित्रानं स्वयंपाक केला. दोघं गप्पा मारत जेवली. निघताना चित्रानं त्याच्याशी शेकहॅन्ड केला व ‘‘पुन्हा या.’’ म्हटलं. आता चित्राचा प्रोजेक्ट पूर्ण होत आला होता. तिच्या टेस्ट, परीक्षणं सुरू होती. ते सर्व यशस्वी झाल्यावर ती अमेरिकन कंपनी विकत घेणार होती. त्याचवेळी तपनच्या आईची तब्येत खूप बिघडली. हे चित्राला समजलं तेव्हा ताबडतोब टॅक्सी करून ती तपनकडे गेली व त्याला अन् आईला कोलकत्त्याला घेऊन आली. कारण इथं चांगले डॉक्टर्स अन् चांगली इस्पितळं होती. आईला चांगल्या इस्पितळमिध्ये एडमिट केलं. तपनही रजा घेऊनच आला होता. त्या काळात तो दिवसा घरी व रात्री आईजवळ राहत होता. पंधरा दिवसांनी आईची तब्येत बरीच सुधारली. तिला डिसचार्ज मिळाला. या काळात तपन व चित्रा एकमेकांना समजू शकले.

चित्रानं आईला सरळ आपल्या घरीच आणलं. अजून त्यांना विश्रांतीची गरज होती. तपन आठ दिवसांनी त्याच्या कामावर जाऊन आला. आपलं काम सांभाळून चित्रा आईची सेवा करत होती. एक बाई घरकाम व स्वंयपाकाला होतीच. शिवाय ती आईजवळही थांबायची.

आई पूर्णपणे बरी झाली. निघताना चित्राला जवळ घेऊन म्हणाली, ‘‘पोरी, पोटची लेक काय करेल, इतकं तू माझं केलं आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत…मी जे काही विचारलंय त्यावरही विचार कर.’’

‘‘कशाबद्दल म्हणताय आई?’’

‘‘तपन आणि तुझ्याबद्दल…’’

‘‘तुमच्या आशिर्वादामुळे माझा हा प्रोजेक्ट पूर्ण होतोय. दोन आठवड्यात सगळं काम पूर्ण होऊन आम्हाला त्याचा रिझल्टही कळेल…त्यानंतर मी तुमचं म्हणणंही ऐकेन.’’

चित्राच्या या उत्तरावर आई आणि तपन चित्राकडे बघू लागले. आज प्रथमच तिनं तिच्याकडून होकार दर्शवला होता.

चित्राच्या आईवडिलांनाही चित्राची काळजी वाटत असे. चित्रानं त्यांना तपनबद्दल सांगितलंच होतं. तपननं तिला त्या रात्री केलेली मदत ती विसरू शकत नव्हती. चित्राचे वडील एकदा बोकारोला जाऊन तपनची सर्व माहिती काढून आले होते. तपनबद्दल त्यांना फार चांगले रिपोर्ट मिळाले होते. चित्राशी तपननं लग्न केलं तर दोन एकटे जीव प्रेमानं संसार करतील असं त्यांनाही वाटत होतं.

त्यानंतर सुमारे तीन आठवड्यातच तपनला चित्राचा फोन आला. त्यांचं प्रॉडक्ट अमेरिकन कंपनीनं भरपूर किंमत देऊन विकत घेतलं होतं. कंपनीच्या चारही पार्टनर्सना दोन दोन कोटींचा फायदा झाला.

तपनच्या आईनं चित्राला फोनवर म्हटलं, ‘‘खूप खूप अभिनंदन पोरी. खूप कष्ट घेतलेस, त्याचं फळही मिळालं. तू कष्टाळू मुलगी आहेस असं तपन नेहमीच सांगतो. अशीच यशस्वी हो.’’

‘‘तुमचे आशिर्वाद आहेत, आई.’’

‘‘आता तरी तपनचा विचार करशील का?’’

‘‘तपन मला आवडतो. तो फार सज्जन व्यक्ती आहे. आणखी काय बोलू? आमच्या कंपनीला अजून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.’’ चित्रानं म्हटलं.

‘‘मग अजून पुन्हा वाट बघावी लागेल?’’ आईनं विचारलं.

‘‘आता नाही वाट बघायची,’’ चित्रा म्हणाली.

तपननं फोन घेतला. तिचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, ‘‘एक सरप्राइज माझ्याकडूनही देतो. मला कंपनीनं दोन प्रमोशन्स एकदम दिली आहेत आणि कोलकत्त्याला बदलीही केली आहे. आठवड्याच्या आत मी तिथं जॉईन होतोय.’’

‘‘आईंना घेऊन लवकर ये. मी अन् माझे आईवडिल वाट बघतोय. आईंना सांग, नो मोअर वाट बघणं… आता त्या म्हणतील तसंच मी करणार.’’ चित्रानं सांगितलं. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

पाठीराखे

कथा * सिद्धार्थ जयवंत

समीर ऑफिसच्या गोष्टी घरात कधीच बोलत नाही, त्यामुळेच त्याच्या ऑफिसात अधूनमधून होणाऱ्या पार्ट्यांना माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. ऑफिसमधल्या ‘ऑफिसेत्तर बातम्या’ मला तिथेच समजतात.

कुणीही नवरा आपलं ‘लफडं’ किंवा ‘प्रकरण’ घरी कधीच सांगत नाही, पण इतरांचं काही असलं तर मात्र आवर्जून घरी सांगतो. मग तीच ‘मसालेदार’ झणझणीत बातमी बायको पार्टीत इतरांबरोबर शेयर करते त्यावेळी सांगणारीच्या डोळ्यांतली चमक अन् ऐकणाऱ्यांची उत्सुकता अगदी बघण्यासारखी असते.

मागच्या आठवड्यात जी पार्टी झाली त्यात सर्व बायकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मी होते. मला सर्वांसमोर अपमानित करत सगळ्यात आधी नीलमने म्हटलं, ‘‘तुझ्या समीरचं, त्या अकाउंट सेक्शनच्या बडबड्या रितूबरोबर प्रकरण सुरू आहे, खरं का.’’

त्यानंतर इंदू, नेहा, कविता, शोभा सगळ्यांनीच या बातमीला दुजोरा देत त्यांना सिनेमाला जाताना, हॉटेलात कॉफी पिताना वगैरे बघितल्याचं सांगितलं. त्यामुळे शंकेला जागा नव्हतीच… मनातून मी हादरले. दु:खीही झाले, पण वरकरणी मात्र शांत व हसतमुखच होते. बातमीचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही हे दाखवण्यात मी यशस्वी ठरले.

त्यांचे सल्ले अन् सहानुभूती मला नको होती म्हणून मी सरळ प्रसाधनगृहात शिरले. तिथल्या एकांतात  मला दोन गोष्टी सुचल्या. एक तर अशा वेळी नवऱ्याशी भांडण करून फायदा होत नसतो. भांडणाचा परिणाम उलटा होतो. दुसरं म्हणजे अशा वेळी रडूनभेकूनही काही उपयोग होत नाही. तेव्हा काही तरी वेगळीच युक्ती करायला हवी.

यांचं प्रकरण नेमकं किती पाण्यात आहे याचा अंदाज घेण्यासाठी मी प्रसाधनगृहातून बाहेर पडले अन् पार्टी हॉलमध्ये गेले.

हॉलच्या एका कोपऱ्यात ती दोघं मला हसतबोलत असलेली दिसली. मी चेहऱ्यावर खोटं हसू आणलं अन् बेदरकारपणे चालत त्या दोघांपाशी पोहोचले.

मला अचानक आपल्याजवळ बघून दोघंही एकदम दचकलीच! त्यांच्या मनात चोर असणार हे सांगणारा तो पुरावाच होता.

‘‘रितू, किती सुंदर दिसते आहेस? तुझा ड्रेसही फार छान आहे हं! मी तिची स्तुती केल्याने ती जरा खूष झाली.

मग मी असंच थोडं इकडचंतिकडचं बोलत राहिले. एखादा विनोद ऐकवला. तीही त्यामुळे मोकळी झाली. मोकळेपणाने हसूबोलू लागली.

समीरला माझ्या वागण्यात कोणतीच आक्षेपार्ह गोष्ट न आढळल्यामुळे तो निर्धास्त झाला अन् तेथून निघून गेला. दुसऱ्या ग्रुपमध्ये मिसळला.

मनातला राग अन् तिरस्कार लपवत मी खूपच वेळ रितूबरोबर घालवला. त्यामुळे रितू व समीर यांना एकत्र येण्याची संधी मी मिळू दिली नाही.

मी रितूला खूपदा ‘एकदा घरी ये ना.’ असं म्हणत होते. शेवटी एकदाचं तिनेही मला ‘घरी या,’ असं आमंत्रण दिलं. मला तेच हवं होतं.

मनातून मी उदास होते. समीरच्या विश्वासघाताने मी दुखावली गेले होते. पण वरकरणी तसं काहीच भासवत नव्हते. मनातून मात्र दोघांना धडा कसा शिकवायचा याचा बेत ठरवत होते.

माझं औदासीन्य सासूबाईंच्या नजरेतून सुटलं नाही. त्या तोंडाच्या फटकळ, पण मनाच्या फारच प्रेमळ आहेत. त्यांनी खोदूनखोदून विचारल्यावर मी त्यांना सगळं काही सांगून टाकलं. त्यानंतर दोन दिवस आम्ही खूप काही विचारविनियम केला. एकूणच त्यांच्यापाशी बोलल्यामुळे माझं औदासीन्य दूर झालं अन् माझ्यात नवा उत्साह संचारला.

नंतरच्या आठवड्यात समीर तीन दिवसांच्या टूरवर गेला. मी नेमका शनिवार निवडला अन् सकाळी दहाच्या सुमाराला रितूच्या घरी पोहोचले.

रितूने हसून माझं स्वागत केलं, तरी पण तिच्या डोळ्यांत काळजी अन् आश्चर्याचे भाव होतेच.

‘‘अगं, समीर टूरवर गेलाय, मला वेळ होता, तुझी आठवण झाली. म्हटलं नव्या मैत्रीला खतपाणी घालायचं तर वरचेवर भेटायला हवं. म्हणून तुझ्याकडे आले,’’ मी अगदी आपलेपणाने बोलले.

‘‘तुमचं स्वागत आहे सीमाताई, राहुलला का नाही आणलंत?’’ तिने ड्रॉइंगरूमकडे जात विचारलं.

‘‘माझी नणंद आलीए माहेरी, राहुल तिच्या दोन मुलांबरोबर खेळतोय.’’

‘‘काय घ्याल? चहा की कॉफी?’’

‘‘चहा चालेल… रितू अगं, रिक्शातून उतरताना माझ्या कमरेत उसण भरलीए… मी जरा आडवी होऊ का?’’

‘‘हो, हो….’’ तिने पटकन मला उशी दिली अन् मी तिच्या बेडवर आरामात लोळले. ती चहा करायला गेली.

चहाबरोबर तिने बरंच काही फराळाचंही आणलं होतं. आम्ही मजेत चहाफराळ आटोपला. लवकरच आम्ही अनेक विषयांवर मोकळेपणाने बोलू लागलो.

बोलताबोलता मी तिच्या लग्नाचा विषय काढला. ती थोडी बावरली, घाबरली.

‘‘तू लव्ह मॅरेज करणार की, ठरवून लग्न करणार?’’

या प्रश्नावर ती जरा बावचळली. ‘‘बघूया कसं काय ते,’’ ती कशीबशी उत्तरली.

‘‘तुझ्यासारख्या देखण्या, स्मार्ट, मिळवत्या मुलीला तर किती तरी मित्र असतील. कुणाशी तरी नक्कीच प्रकरण चालू असणार… हो ना? सांग ना? तो भाग्यवंत कोण आहे?’’ मी तिचा पिच्छाच पुरवला.

आता ती कशी सांगणार की तिचं प्रकरण माझ्याच नवऱ्याबरोबर चाललंय म्हणून? मी अजून थोडा वेळ याच विषयावर छेडून तिला छळलं… मला त्यात खूपच मजा येत होती.

तेवढ्यात माझ्या मोबाइलवर दोन फोन आले. एक माझ्या सासूबाईंचा अन् दुसरा माझ्या भिशीतल्या मैत्रिणीचा. दोघींनाही मी आता रितूकडे आल्याचं अन् माझ्या कमरेत उसण भरल्याचं अगदी रंगवून सांगितलं.

मध्ये जेमतेम अर्धा तास गेला असेल तेवढ्यात माझ्या सासूबाई, नणंद स्नेहा, तिची दोन मुलं अन् रोहित असे सगळेच रितूच्या घरात दाखल झाले. मुलांनी सरळ टीव्हीकडे मोर्चा वळवला अन् ती कार्टून चॅनल लावून बसली. सासूबाई अन् स्नेहा सोफ्यावर बसून माझ्या कमरेतल्या उसणीबद्दल चौकशी करू लागल्या.

‘‘आई, तुम्ही माझी फारच काळजी करता,’’ मी भरल्या गळ्याने बोलले.

‘‘तू एक नंबरची बेपर्वा मुलगी आहेस. हजारदा सांगितलंय तुला की वजन कमी कर, पसारा आटोक्यात आण. एवढं वजन असल्यावर कमरेत उसण भरणारच. पण तुला ऐकायला नको…’’ सासूबाई कडाडल्या. मी ओशाळून रितूकडे बघितलं.

सासूबाईंचा कडकलक्ष्मी अवतार बघून रितू घाबरली होती. ती प्रथमच त्यांना बघत होती.

‘‘समीरदादा जेव्हा एखाद्या सुंदर फुलपाखराच्या मागे जातील तेव्हा वहिनीचे डोळे उघडतील,’’ स्नेहाने म्हटलं. त्यावर सासूबाई भडकून उठल्या.

‘‘तुझ्या दादाच्या तंगड्या तोडीन अन् त्या फुलपाखराचे पंख उपटीन. समजलीस?’’ त्यांचा आवाज तापलेला होता.

‘‘अगं, मी गंमत केली, चिडतेस काय?’’

‘‘मग असं मूर्खासारखं बोलतेस कशाला?’’

स्नेहाने तोंड वाकडं केलं अन् ती गप्प बसली. रितू उगीचच बोटं एकमेकांत गुंफत, पुन्हा मोकळी करत जमिनीकडे दृष्टी लावून उभी होती. सासूबाईंकडे बघण्याचं धाडस तिला होत नव्हतं.

सासूबाई मला अन् स्नेहाला सांगू लागल्या, ‘‘हल्लीच्या पोरींना समजूतही नाही अन् धीरही नाही. आपला संसार सांभाळण्याची अक्कलही नसते. उगाच याच्या त्याच्या नादी लागायचं… प्रेमविवाह तरी ठीक आहे, पण नुसतंच प्रेम करायचं याला काय अर्थ आहे? जी वाट आपल्या कामाची नाही, त्या वाटेवर चालायचंच कशाला? खरं ना, रितू?’’

‘‘अं?… हं… हो!’’ रितू दचकून हो म्हणाली.

‘‘तुझं लग्न झालंय?’’

‘‘नाही…’’

‘‘कधी करते आहेस लग्न?’’

‘‘लवकरच!’’

‘‘व्हेरी गुड! तुझे आईबाबा कुठेत?’’

‘‘माझे बाबा वारले… आई आहे, ती आज माझ्या मावशीला भेटायला गेली आहे.’’

‘‘कधी येईल?’’

‘‘संध्याकाळी.’’

‘‘मी येईन त्यांना भेटायला. सुने, अगं आज काय इथेच रहायचा बेत आहे का तुझं काय म्हणतंय दुखणं?’’

‘‘आई, दुखणं तर वाढलंय… फार त्रास होतोय…’’ मी कण्हत म्हणाले.

‘‘डॉक्टरांना बोलावूयात का?’’

‘‘नको, नको,’’ मी घाबरल्याचं भासवून म्हणाले, ‘‘रितू तुझ्याकडे आयडेक्स असेल का?’’

‘‘आणते. लगेच आणते,’’ म्हणत रितू पटकन आत गेली. तिच्याकडून मी आयोडेक्स लावून घेतलं.

रितूला माझ्या सासूबाई, तरुण पोरींनी कसं वागायला हवं यावर लेक्चर देत होत्या. स्नेहा मुद्दाम वाकड्यात शिरून त्यांना अधिक चिडवायला भाग पाडत होती. कुठल्याही क्षणी दोघी कडाडून भांडायला लागतील असं वातावरण होतं. त्या वातावरणात रितूचं टेन्शन वाढलं होतं.

तेवढ्यात डोअर बेल वाजली. स्नेहाने जाऊन दार उघडलं. ती परतली तेव्हा तिच्यासोबत माझ्या भिशी ग्रुपच्या तिघी मैत्रिणी अनीता, शालू व मेघा होत्या.

या तिघी खूपच बडबड्या आहेत. त्यांच्या येण्याने मायलेकींमधलं वाक्युद्ध थांबलं. पण खोलीतला कोलाहल मात्र एकदम वाढला.

‘‘आपल्या नव्या मैत्रिणीकडून सेवा करवून घेत आहेस ना, सीमा?’’ डोळे मोठे करत अनीताने म्हटलं अन् सगळेच हसले.

‘‘रितू, तुझ्याबद्दल इतकं ऐकलंय सीमाकडून… सीमा सारखी तुझ्याबद्दल बोलतेय सद्या… बघ हं, तिच्या हृदयात विराजमान होऊन आम्हाला तिथून हाकलून लावू नकोस हं! तू प्लीज, आमच्याशीही मैत्री कर,’’ शालूने रीतूच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं.

‘‘आमच्या नवीन मैत्रीचा पाया भक्कम करण्यासाठी आम्ही गरमागरम समोसे, जिलबी अन् ढोकळाही आणला आहे.’’ मेघाने अशा काही आविर्भावात म्हटलं की रितूलाही हसायला आलं.

आपापली ओळख करून देऊन तिघी बेधडक स्वयंपाकघरात शिरल्या. आयोडेक्स जागेवर ठेवून हात धुऊन रितू स्वयंपाकघरात जाईपर्यंत त्यांचा चहादेखील करून झाला होता.

एक गोष्ट मात्र खरी की, रितूच्या घरात प्रत्येक गोष्ट होती अन् ती जागच्या जागी होती.

मुलांसाठी स्नेहाने फ्रीजमधून ज्यूसचा कॅन काढला. आम्ही सगळे चहा, समोसे, जिलबी खात मजेत गप्पा मारत होतो. रितूच्या फ्लॅटमध्ये इतका दंगा कधीच झाला नसेल.

माझ्या मैत्रिणींनी रितूशी लगेच मैत्री केली. तीही अगदी मोकळेपणाने त्यांच्याशी बोलत होती. जणू खूप जुनी ओळख असाव.

‘‘सीमा, रितूशी मैत्री होण्याचा एक फायदा तुला नक्कीच होईल,’’ खट्याळपणे शालूने म्हटलं.

‘‘कसला फायदा?’’ मीही उत्सुकतेने विचारलं.

‘‘अगं, समीरच्याच ऑफिसमध्ये असल्याने रितू तुला तिथली बातमी बरोबर देईल. म्हणजे जर तुझ्या समीरचं तिथे कुणाशी लफडं झालं तर ही तुला लगेच सूचना देईल की!’’

‘‘अगंबाई खरंच? रितू, तू माझे डोळे बनून समीरवर लक्ष ठेवशील?’’ मी खूपच प्रेमाने रितूला गळ घातली.

रितूचे गाल एकदम गुलाबी झाले. तिने उत्तर दिलं नाही. फक्त मान डोलावली अन् मग ती टेबलावरचं आवरायला लागली.

खोलीतला पसारा आवरून होतोय तेवढ्यात माझे सासरे तिथे पोहोचले. ते येताच वातावरण बदललं.

माझे सासरे एकदम कडक आहेत. माझ्या मैत्रिणींनी पटापट पदर दोन्ही खांद्यावरून घेतला अन् वाकून त्यांना नमस्कार केला. सगळ्या अशा गप्प झाल्या जणू त्यांना बोलायला येतंच नाही.

‘‘सूनबाई, घरी चलण्याच्या स्थितीत आहेस की अॅम्ब्युलन्स मागवू?’’ त्यांनी गंभीरपणे विचारलं.

‘‘चलेन बाबा,’’ मी नम्रपणे उत्तरले.

‘‘तू धसमुसळेपणाने चढतेस, उतरतेस, जरा सावकाशीने कामं करावीत ना?’’

‘‘होय बाबा.’’

‘‘मी डॉक्टर मेहंदळ्यांना फोन केलाय. घरी जाताजाता त्यांना दाखवून, घरी जाऊ.’’

‘‘होय बाबा’’

‘‘इथे कशाला आली होतीस?’’

‘‘या रितूला भेटायला आले होते.’’

‘‘हिला कधी बघितली नाही… नवी ओळख आहे का?’’

‘‘हो बाबा, ही ना यांच्याच ऑफिसात काम करते.’’

‘‘रितू बाळा, तू एकटीच राहातेस इथे?’’

‘‘नाही काका, आई असते माझ्याबरोबर.’’ बाबांच्या आवाजानेच रितूला कापरं भरलं होतं.

‘‘असू दे, असू दे. बाबा नाहीत तरी आम्ही आहोत ना? तुला कधीही गरज वाटली तर आम्हाला सांग,’’ बाबा बोलले मग आमच्याकडे वळून म्हणाले, ‘‘आता निघा…’’

बाबा निघाले तसे आम्हीही उठलो.

निघतानिघता सासूबाई रितूला म्हणाल्या, ‘‘रितू बेटा, आता लवकर तुझ्या लग्नाचं आमंत्रण आमच्या हातात पडू दे. उशीर झाला तर चांगली मुलं मिळत नाहीत.’’

‘‘रितू, तुला आम्ही आमच्या भिशी ग्रुपची मेंबर करून घेऊ. मी तुला नंतर फोन करते.’’ अनीताच्या या प्रस्तावाला आम्ही सगळ्यांनी अनुमोदन दिलं.

तिन्ही मुलं, ‘‘थँक्यू आंटी,’’ म्हणत बाहेर निघून गेली. सर्वात शेवटी मी रितूचा आधार घेत दाराबाहेर आले.

‘‘रितू, या सगळ्यांचं इतक्या मोकळेपणाने लोळणं, वागणं तुला खटकलं तर नाही ना?’’ मी तिला जरा काळजीने विचारलं.

‘‘नाही ताई, ही सगळी तर खूपच भली माणसं आहेत.’’ ती म्हणाली. पण मनातून ती थोडी नर्व्हस झाली होती.

‘‘तुला सांगते, रितू, ही खरोखर फार भली माणसं आहेत. आणि मुख्य म्हणजे यांचा मला आधार आहे. यांच्यामुळे मला स्वत:ला खूपच सुरक्षित वाटतं. हे माझे पाठीराखे, सतत मला मदत करतात. माझ्या संसाराकडे कुणी वाकड्या नजरेने बघायचं धाडसही करू शकत नाही. यांच्याशी भांडण करणं, यांना चॅलेंज करणं महाकठीण आहे. आपली मैत्री झाली आहे. तू माझी मैत्रीण म्हटल्यावर ही सगळी माणसं तुझ्याही पाठीशी उभी राहातील. असे पाठीराखे भाग्याने मिळतात. स्वत:ला सुरक्षित वाटणं ही फार मोठी गोष्ट असते. रितू, एरवी लोक किती भीत भीत जगत असतात.’’

रितूने मान डोलवली. ‘‘सांभाळून जा,’’ तिने म्हटलं… आम्ही प्रेमाने एकमेकींचा निरोप घेतला.

दोन्हीतिन्ही गाड्यांमध्ये सर्वांनी बसून घेतलं होतं. माझे पाठीराखे माझी  वाटच बघत होते. रितूचा आधार सोडून मी व्यवस्थित चालत त्यांच्यात जाऊन मिसळले. माझ्या कमरेत उसण भरलीच नव्हती. सगळं काही ठरवलेल्या योजनेप्रमाणेच पार पडलं होतं.

मी दोन बोटांनी व्ही फॉर व्हिक्टरीची खूण करताच सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें