* भारत भूषण श्रीवास्तव
२३ डिसेंबर २०२३ रोजी मोक्षदा एकादशीच्या दिवशी विष्णूसह इतर देवी-देवता नीट उठलेही नव्हते, तोच खाली जमिनीवर असलेले तरुण अविवाहित आरडाओरड करू लागले की, आता जर तुम्ही खरोखरंच जागे झाले असाल तर आमचे लग्न लावून द्या. तुम्ही जर हे करू शकत नसाल तर नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि पदाचा राजीनामा द्या, अशी मागणीही या तरुणांनी केली.
भारत भूमीतील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे सकाळीच सुमारे ५० अविवाहित, वराची वेषभूषा करून घोड्यावर स्वार झाले होते. बँड, लग्नाच्या मिरवणुकीसह हे अविवाहित डीएम ऑफिस म्हणजे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या दिशेने नवरदेव मोर्चा घेऊन निघाले होते.
आजकाल, विष्णुजींना जगात जास्त काम आहे, ते पालनकर्ते असल्याने कदाचित लग्नासारख्या क्षुल्लक प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणूनच भजन आणि आरती गाऊन त्यांना याचसाठी जागे केले जाते की, हे भगवंता उठ आणि विश्वाच्या शुभ कार्यांसह लग्न लावून दे. जी प्रत्येक अविवाहित तरुणाची रोजगारानंतरची दुसरी सर्वात मोठी इच्छा असते. या तरुणांनी शहाणपण दाखवत लग्न पार पाडण्यासाठी कलियुगात पृथ्वीवरील विष्णूचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनाऐवजी जाहिरात आवश्यक
या अविवाहित तरुणांचे दयनीय रडगाणे वरच्यापर्यंत पोहोचले असेल, अशी आशा कमीच आहे. खालच्या देवांबद्दल, बोलायचे झाल्यास ते फक्त मनातल्या मनात हसून केवळ निवेदनच स्वीकारू शकतात. जर कोणी थोडेसेही संवेदनशील असेल तर निदर्शनास आणून देईल की, हे बंधूंनो, मला निवेदन देण्याऐवजी जाहिरातीची मदत घ्या. माझ्यावर किंवा देवावर विसंबून राहू नका, अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य फक्त वधू शोधण्यातच खर्ची पडेल आणि तुम्ही या नश्वर जगाला अविवाहित म्हणूनच सोडून जाल.
हा सल्लाही त्यांच्या मनात कुठेतरी दडला असेल की, खरा पुरुष असशील तर पृथ्वीराज बनून तुझ्या संयोगिताला घेऊन येशील. सोलापुरातील नवरदेव मोर्चा पाहून लोक आस्थेने आणि आश्चर्याने बघतच राहिले होते, हे तुमच्याही कानावर आले असेलच ना?





