जेणेकरून श्वास दरवळत राहील

* गरिमा पंकज

एखादी व्यक्ती चेहऱ्याने कितीही सुंदर असली तरी बोलतांना किंवा हसताना जर तिच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर सारे सौंदर्य व्यर्थ जाते. लोकांना अनेकदा श्वासातून येणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

तोंडातून दुर्गंधी येण्याला वैद्यकीय भाषेत हॅलिटोसिस म्हणतात. श्वासातून दुर्गंधी अनेक कारणांमुळे येऊ शकते. जसे की तोंडाला कोरडे पडणे, अन्नामध्ये प्रथिने, साखर किंवा आम्लाचे जास्त प्रमाण, धूम्रपान, कांदा आणि लसूण खाणे, कोणताही जुनाट आजार, कर्करोग, सायनस इन्फेक्शन, कमकुवत पचनशक्ती, किडनी समस्या, पायोरिया किंवा दात किडणे इ. चांगल्या ओरल हेल्थ सवयी अवलंबून आणि तुमचा आहार व जीवनशैली बदलून तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होऊ शकता :

तोंडाची व्यवस्थित स्वच्छता

दररोज दात चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. दिवसातून दोनदा किमान २ मिनिटे ब्रश करा, ब्रश जास्त हार्ड नसावा याची काळजी घ्या. दर २-३ महिन्यांनी ब्रश बदलत रहा. केवळ दातच नाही तर जिभेची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. खाण्यापिण्यामुळे जिभेवर एक थर जमा होतो, ज्यामुळे श्वासाला दुर्गंधी येते.

त्यामुळे रोज टंग क्लीनरच्या मदतीने जीभदेखील स्वच्छ करा, जीभेवर मागून पुढच्या दिशेने ब्रश करा आणि तसेच जिभेचे कोपरेही स्वच्छ करायला विसरू नका.

दात फ्लॉस करा

फ्लॉस केल्याने दातांमधील प्लेक आणि बॅक्टेरिया निघून जातात, जे ब्रशने निघत नाहीत. दिवसातून एकदा तरी फ्लॉस अवश्य करा, फ्लॉस केल्यामुळे तोंडात अडकलेले अन्नाचे कण आणि अवशेषदेखील निघून जातात. तसे न केल्यास दात किडण्याची शक्यता असते.

माउथवॉशचा वापर

श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी माउथवॉश वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. अँटिसेप्टिक माउथवॉश तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतो आणि दुर्गंधी लपविण्यासदेखील मदत करतो.

श्वास दरवळण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे माउथ फ्रेशनर उपलब्ध आहेत, कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोट्रेक्ट स्प्रे, लिस्टरिन फ्रेश बर्स्ट माउथवॉश, लिस्टरिन कूलमिंट माउथवॉश, एलबी ब्रीथ हर्बल शुगर फ्री ब्रेथ फ्रेशनर स्प्रे, कोलगेट प्लाक्स पेपरमिंट माउथवॉश, बायोआयुर्वेद अँटी बॅक्टेरियल जर्म डिफेन्स माउथवॉश, स्पीयरमिंट माउथ फ्रेशनर, लीफोर्ड फेदर ग्लोबल जिओफ्रेश आयुर्वेदिक इन्स्टंट कूल, मिंट माउथ फ्रेशनर, जिओफ्रेश आयुर्वेदिक इन्स्टंट माउथ फ्रेशनर, पतंजली माउथ फ्रेशनर, बायोटिन ड्राय माउथवॉश, ट्रिसा डबल अॅक्शन टंग क्लीनर इ.

शुगर फ्री डिंक किंवा मिंट वापरा

शुगर-फ्री डिंक किंवा पुदीना तुमच्या तोंडात लाळ निर्माण करून हानिकारक जीवाणूंना बाहेर काढण्यास मदत करतात. ते तुमच्या श्वासाची दुर्गंधी काही काळ लपवूही शकतात.

बेकिंग सोड्याचा वापर

आठवडयातून एकदा बेकिंग सोडयाने दात ब्रश केल्याने बॅक्टेरिया बऱ्याच प्रमाणात नष्ट होतात. ब्रशच्या ब्रिस्टल्सवर हलका बेकिंग सोडा लावून तुम्ही सामान्यपणे ब्रश करू शकता किंवा मग बेकिंग सोडा माउथवॉश म्हणूनही वापरता येईल.

आहारात सुधारणा

जास्त मसालेदार अन्न, कांदा, लसूण, आले, लवंग, काळी मिरी इत्यादींचे सेवन केल्याने तोंडाला दुर्गंधी येते. यांचा वापर कमी करा आणि जेव्हाही कराल तेव्हा चुळ भरून किंवा ब्रश करून तोंड स्वच्छ ठेवा, कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन करू नका, नाश्त्यात अखंड धान्य वापरा, धूम्रपान टाळा आणि तंबाखू टाळा.

उन्हाळ्यात बाळाची अशी करा देखभाल

* डॉ. कृष्ण याद

नवजात बालकासाठी उन्हाळ्याचा मोसम खूप असह्य असतो; कारण प्रथमच ते या वातावरणाचा सामना करत असतं. मोठ्याने ओक्साबोक्शी रडणं, खूप घाम येणं, केस ओले होणं, गाल लाल होणं आणि वेगाने श्वासोच्छ्वास घेणं यांसारखी लक्षणं या गोष्टींचे संकेत असतात की मुलं अति उकाड्याने त्रासलेली आहेत.

ओवर हीटिंग उन्हाळ्यात डायरियाला थेट कारणीभूत ठरतं, जे अनेक नवजात शिशूंसाठी घातकही ठरू शकतं.

उन्हापासून बचाव

उन्हाळ्याच्या मोसमात बाळाला उन्हाच्या प्रखर किरणांपासून दूर ठेवावं. ६ महिन्यांहून कमी वयाच्या बाळाच्या त्वचेमध्ये सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षा करणारा मेलानिन हा घटक खूप कमी असतो, जो त्वचा, डोळे आणि केसांना रंग प्रदान करतो. मेलानिनच्या अभावामुळे सूर्याची किरणं बाळाच्या त्वचेतील पेशींना कायमस्वरूपी हानी पोहोचवू शकतात.

तेलमालीश करा

बाळाला योग्य तेलमालीश केल्यास बाळाचे टिश्यू आणि मांसपेशी खुलतात आणि यामुळे त्याचा उत्तम विकास होतो. बाळाच्या नाजूक त्वचेला सर्वात चांगल्याप्रकारे सूट करणाऱ्या तेलाची निवड जशी आवश्यक आहे तशीच ही बाबही लक्षात घेणं जरुरी आहे की यामुळे चिकचिकीतपणा जाणवणार नाही, तेलाऐवजी मसाजिंग लोशन आणि क्रीमही वापरता येईल. अंघोळ घालताना ते व्यवस्थित बाळाच्या शरीरावरून स्वच्छ होईल हे बघा. कारण तेल बाळाच्या स्वेदग्रंथीचं कार्य रोखू शकते.

टबमध्ये अंघोळ घालणं

उकाड्यापासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे अंघोळ करणं. तसं बघता प्रत्येक वेळेस अंघोळ घालण्याऐवजी बाळाला ओल्या कपडाने पुसून घ्यावं. परंतु जेव्हा बाळ उकाड्याने अस्वस्थ होत असेल, तेव्हा त्याला पाण्याने भरलेल्या टबमध्ये अंघोळ घालावी, यात पाण्याचं तापमान कोमट असलं पाहिजे.

टाल्कम पावडर

टबमध्ये अंघोळ घातल्यानंतर मुलांच्या शरीरावर टाल्कम पावडर लावणं चांगलं मानलं जातं. जेथे काही मुलांचं घामोळे कमी करण्यात टाल्कम पावडर उपयुक्त ठरते, तेथे काही वेळा याचा त्रासही होऊ शकतो. तेव्हा आपल्या तळहातावर थोडी पावडर घेऊन बाळाच्या त्वचेवर लावावी, त्याच्यावर पावडर फवारू नये.

नियंत्रित तापमान

बाळाच्या खोलीला दिवसा थंड राखण्यासाठी पडदे लावून खोलीत अंधार करा. पंखा सुरू ठेवा. मुलांना एअरकंडिशनरच्या थेट संपर्कात कधी ठेवू नका; कारण यामुळे बाळाला सर्दीपडसंसुद्धा होऊ शकतं.

उपयुक्त पोशाख

आई बहुतेकदा द्विधा मन:स्थितीत असते की बाळाला कोणते कपडे घालावेत. असा समज आहे की नवजात शिशूला खूप गरम कपड्यांमध्ये ठेवलं पाहिजे. कारण गर्भाच्या तुलनेत बाहेरचं तापमान आतल्या तापमानाहून थंड असतं. परंतु उन्हाळ्याच्या मोसमात त्यांच्या उबदार कपड्यांची संख्या कमी करून त्यांना कमी कपड्यांमध्ये ठेवू शकता. त्यांना सुती सैलसर कपडे घालावेत जेणेकरून त्यांच्या त्वचेला हवेचा स्पर्श होईल आणि त्यांना आरामदेह वाटेल. सुती कपडे मुलांसाठी फायदेशीर असतात आणि हे घामसुद्धा शोषून घेतात. बाळाचं उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना त्याला हॅट जरूर घालावी.

त्या दिवसात काय खावं

– नमामी अग्रवाल, सीईओ, नमामी लाइफ

वयात येण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत महिलांनी दररोज सुमारे १८ मिलीग्रॅम लोहाचे सेवन करणे आवश्यक आहे. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्यास मीनोरहेजिया म्हणतात. यामुळे शरीरात लोहाची कमतरता उद्भवू शकते. एका अंदाजानुसार प्रजनन वयाच्या ५ टक्के स्त्रियामध्ये हेवी पिरियड्समुळे लोहाची कमतरता होते व त्यामुळे त्यांच्यात अशक्तपणा येतो. मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होत असल्यामुळे स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत या आहाराचे सेवन करून लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते.

हीम लोह : हीम लोह प्राणी उत्पादनांमध्ये आढळते. हीम लोह नॉनहीम लोहापेक्षा वेगाने शोषले जाते. या खाद्य पदार्थांमध्ये हीम लोह भरपूर प्रमाणात आढळते.

चिकन लिवर : कचिकन लिवर सर्व्ह करताना त्यांत १२.८ मिलीग्रॅम लोह असते, जे रोजच्या गरजेच्या ७० टक्के असते.

शेलफिश : १०० ग्रॅम शेलफिशमध्ये २८ मिलीग्रॅमपर्यंत लोह असते, जे रोजच्या गरजेच्या १५५ टक्के असते.

अंडी : १०० ग्रॅम उकडलेल्या अंडयात १.२ मिलीग्रॅम लोह असते.

नॉनहीम लोह : वनस्पतींमधील खाद्य स्त्रोतांमध्ये नॉनहीम लोह आढळते. हे हीम लोहसारखे शरीरात वेगाने शोषले जात नाही, परंतू शाकाहारी लोकांसाठी ते लोहाचे प्रभावी स्त्रोत आहे. खाली नॉनहीम लोहचे सर्वोत्तम स्त्रोत दिले आहेत –

हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्या-जसे की पालक, स्विस कार्ड, काळे आणि बीट ग्रीनच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये २.५, ६.५ मिलीग्रॅम लोह असते, जे रोजच्या गरजेच्या १४ ते ४० टक्के असते. कोबी आणि ब्रोकोलीदेखील लोहाचे चांगले स्रोत आहेत.

टोमॅटो : अर्धा कप टोमॅटो पुरी किंवा पेस्टमध्ये जवळपास ३.९ मिलीग्रॅम लोह असते. याशिवाय टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, ज्यामुळे लोहाचे चांगले शोषण होण्यास मदत होते.

राजगिरा : राजगिरा हा ग्लूटेनलेस धान्याचा एक प्रकार आहे. १ कप पिकलेल्या राजगिऱ्यामध्ये ५.२ मिलीग्रॅम लोह असते. हे रोजच्या गरजेच्या २९ टक्के आहे. याशिवाय हे प्रोटीनचे संपूर्ण स्त्रोतदेखील आहे.

ओट्स : ओट्सदेखील ग्लूटेनलेस सुपर ग्रेन आहे. हा आहार अनेक प्रकारे फायदेशीर आहे. १ कप पिकलेल्या ओट्समध्ये रोजच्या गरजेच्या १९ टक्के लोह असते. हा आहार पचनयंत्रणेसाठीही फायदेशीर आहे.

किडनी बीन्स/राजमा : उकडलेल्या राजमाचा १ कप ४ मिलीग्रॅम लोह देतो. राजमा प्रथिने व फायबरचा चांगला स्रोत आहे आणि रक्तातील साखरेची सामान्य पातळी राखण्यास मदत करतो.

खजूर : खजूर हा नैसर्गिक साखरेचा एक उत्तम स्रोत आहे. याशिवाय १०० ग्रॅम खजूरमध्ये रोजच्या गरजेपैकी ५ टक्के लोह असते.

चणे/छोले : १०० ग्रॅम हरभऱ्यांमध्ये ६.६ मिलीग्रॅम लोह असते. त्यात प्रथिने आणि फायबरही मुबलक प्रमाणात आढळतात.

सोयाबीन : १ कप सोयाबीनमध्ये ८.८ ग्रॅम लोह असते.

लोह शोषणाशी संबंधित पैलू

लोहयुक्त आहाराचे व्हिटॅमिन सी सोबत सेवन केले पाहिजे. कारण लोह शोषण्याचे प्रमाण व्हिटॅमिन सीमुळे ३०० टक्क्यांनी वाढते. म्हणून आपल्या आहारात संत्री, किवी, लिंबू, द्राक्षे आणि टोमॅटोचा समावेश करा.

खाण्याबारोबर चहा-कॉफी पिऊ नका, कारण यामुळे लोह शोषण्याचे प्रमाण ५० ते ९० टक्क्यांपर्यंत कमी होते. चहामध्ये असलेले टॅनिन आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन लोह शोषण्यास प्रतिबंध करते. कॅल्शियमचे मोठया प्रमाणात सेवन केल्यामुळे लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून लोह समृध्द आहारासह दूध, चीज, लस्सी इत्यादींचे सेवन करू नका.

शिजवलेल्या पालकामध्ये अधिक लोह असते, कारण कच्च्या पालकात ऑक्द्ब्रॉलिक अॅसिड किंवा ऑक्सलेट असते, जे लोहाचे शोषण रोखू शकते.

तृणधान्ये, शेंग, सोयाबीनमध्ये फायटेट्स असतात, ज्यामुळे लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते.

जेव्हा सतावू लागेल कंबरदुखी

* डॉक्टर मनीष वैश्य, सहसंचालक, न्यूरो सर्जरी विभाग, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वैशाली

डोकेदुखीनंतर कंबरदुखी ही सध्याची सर्वसामान्य आरोग्याची समस्या बनत चालली आहे. वाढत्या वयाच्या लोकांनाच नव्हे तर तरुण पिढीलाही हे दुखणे सतावू लागले आहे.

कंबरदुखी

आपल्या पाठीच्या कण्यात ३२ कशेरुका असतात. यातील २२ गतिमान असतात. जेव्हा यांची गती बिघडते तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. पाठीच्या कण्याव्यतिरिक्त आपल्या कमरेच्या रचनेत कार्टिलेज (डिस्क), स्नायू, लिगामेंट म्हणजे अस्थिबंध इत्यादी असतात. यातील कोणत्याही एकामध्ये जरी समस्या निर्माण झाली तरी कंबर दुखू लागते. यामुळे उभे राहताना, वाकताना, वळताना त्रास होतो. सुरुवातीच्या दुखण्यावेळीच योग्य पावले उचलल्यास ही समस्या गंभीर होत नाही.

काय आहेत कारणे

कंबरदुखीच्या समस्येत महिलांची जीवनशैली महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. याव्यतिरिक्त इतरही अनेक कारणे आहेत :

* शरीराचे वजन सामान्य वजनाच्या तुलनेत अधिक वाढणे.

* स्नायूंवर ताण येणे.

* अजिबात उसंत न घेता दीर्घकाळ काम करणे.

* नेहमी वाकून चालणे किंवा वाकून बसणे.

* ऑस्टिओपोरोसिस म्हणजे अस्थिरोगामुळे हाडे कमकुवत होणे.

* दीर्घ काळापर्यंत झोपून राहणे.

* शरीराचे पोश्चर बिघडणे.

* प्रजनन म्हणजे पुनरुत्पादक अवयवांचे संक्रमण, पेल्विक इन्प्लेमेटरी डिसिस म्हणजे ओटीपोटाचा दाह.

* गर्भावस्था.

* उंच टाचांच्या चपला घालणे.

गर्भावस्था आणि कंबरदुखी

गर्भावस्थेदरम्यान महिलांची कंबर दुखणे सामान्य बाब आहे. गर्भावस्थेदरम्यान महिलांचे वजन वाढते आणि बाळाला जन्म देण्यासाठी लिगामेंट्स म्हणजे अस्थिबंध सामान्य करण्यासाठी हार्मोन्सचा स्त्राव वाढतो. बहुतांश गर्भवती महिलांना ५ व्या ते ७ व्या महिन्यादरम्यान कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. ज्यांची आधीपासूनच कंबर दुखत असते अशा महिलांमध्ये गर्भावस्थेदरम्यान कंबरदुखीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिकच वाढते.

पूरक आहार घेताना घाबरू नका

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात ५०हून अधिक वयाच्या महिलांपैकी प्रत्येक दुसरी महिला अस्थिरोगाची शिकार आहे. यामुळे त्रस्त ५० टक्के महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता असते. अशावेळी त्यांना कॅल्शिअम आणि ड जीवनसत्त्व, विशेषत: जीवनसत्त्व डी ३ आणि बायोफॉस्फोनेट हे सप्लिमेंट म्हणजे पूरक आहार म्हणून घेण्याचा सल्ला दिला जातो.

कंबरदुखीत लपलेले धोके अनेक

कंबरदुखी ही केवळ पाठीचा कणा किंवा कंबरेच्या स्नायूंमधील समस्येमुळे निर्माण होत नाही तर ती अनेक गंभीर आजारांचा संकेत असू शकते. म्हणूनच कंबरदुखीकडे दुर्लक्ष करू नका. त्यावर तात्काळ उपचार करा.

* मूत्रपिंडाशी संबंधित आजार किंवा संक्रमण.

* मूत्राशयात संक्रमण.

* स्पायनल ट्यूमर.

उपचार

कंबरदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. सर्वसामान्यपणे ८५-९५ टक्के कंबरदुखी शस्त्रक्रिया न करताच औषध, व्यायाम, पोश्चर नीट करण्याचे तंत्रज्ञान आणि फिजिओ थेरपीच्या विविध तंत्राने बरी करता येते. फक्त ५-१० टक्के प्रकरणांमध्येच शस्त्रक्रियेची गरज भासते.

डॉक्टर एक्सरे, एमआरआय किंवा सिटी स्कॅनद्वारे कंबरदुखीच्या कारणांचा शोध घेऊन उपचार करतात.

शस्त्रक्रिया

शस्त्रक्रियेद्वारे डिस्क म्हणजे चकतीला संपूर्ण किंवा आंशिक रुपात बाहेर काढण्यात येते. संपूर्ण डिस्क काढल्यानंतर तेथे कृत्रिम डिस्कचे प्रत्यारोपण केले जाते. याव्यतिरिक्त स्पाईन फ्युजनद्वारेही कंबरेच्या हाडातील बळकटपणा पुन्हा मिळवता येतो.

झोन थेरपी

कंबर आणि चकतीच्या दुखण्यात ओझोन थेरपी हे सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या संपूर्ण प्रक्रियेत १-१ तासाची ६ सिटिंगस ३ आठवडयांदरम्यान असतात.  कंबरदुखीवर उपचार शक्य आहे. योग्य निदान आणि उपचारांद्वारे ती पूर्णपणे बरी करता येऊ शकते.

भेगा पडलेल्या टाचांना असे बनवा मुलायम

* पारुल भटनागर

जशी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो तशी आपल्या हाता-पायांची घेत नाही. त्यामुळेच ऋतुचक्र बदलताच म्हणजे हिवाळयाला सुरुवात होताच पायांना भेगा पडायला सुरुवात होते. यामागचे कारण म्हणजे पुरेशी काळजी न घेणे आणि दुसरे म्हणजे जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे. कोरडया हवेमुळे हळूहळू शरीरातील ओलावा कमी होऊ लागतो.

शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता असल्यामुळेही टाचांना भेगा पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय करणेही गरजेचे असते, जेणेकरून टाचांना पडलेल्या भेगा बऱ्या होतील आणि भेगांमुळे कोणासमोरही तुम्हाला लाजल्यासारखे वाटणार नाही.

यासंदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव सांगतात की, बाजारात तुम्हाला शेकडो अशा क्रीम मिळतात ज्या टाचांच्या भेगा बऱ्या करण्याचा दावा करतात, पण प्रत्येक महागडी क्रीम आणि केलेला दावा खरा असेलच असे सांगता येत नाही.

त्यामुळेच तुम्ही जेव्हा बाजारातून भेगा पडलेल्या टाचांना बरे करणारे क्रीम खरेदी कराल तेव्हा लक्षात ठेवा की, त्यात कडुलिंबाचा वापर केलेला असेल. यामुळे तुमच्या टाचा लवकर बऱ्या होऊन तेथील त्वचेला आवश्यक ओलावा मिळेल :

* कापराचे तेल शतकानुशतके त्याच्यातील नैसर्गिक गुणांसाठी ओळखले जाते, कारण ते भेगा पडलेल्या टाचांमुळे होणारी जळजळ थांबवण्यासाठी प्रभावी असते. सोबतच ते रक्ताभिसरण वाढवून वेदनेपासून सुटका करते.

* काळया मिरीचे तेल जेवणाची चव वाढवते, सोबतच शतकानुशतके याचा वापर औषधे बनवण्यासाठीही केला जातो. यात मोठया प्रमाणावर फॉलिक अॅसिड, कॉपर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम असते. ते टाचांच्या जखमा बऱ्या करून वेदनेपासून आराम मिळवून देतात.

* पुदिन्याच्या तेलाचा वापर सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात केला जातो, कारण ते त्वचेला तरुण आणि सुंदर ठेवण्याचे काम करते. तणाव दूर करणारे हे सुगंधित तेल भेगा पडलेल्या टाचांची जळजळ दूर करण्यास मदत करते. यातील मिथॉलसारखे घटक टाचांना बरे करण्यासाठी प्रभावी ठरतात.

* लॅव्हेंडर तेलात अँटीसेफ्टिक आणि अँटीइन्फलमेंट्री म्हणजे जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुण असल्यामुळे ते टाचांची भेगा पडलेली त्वचा आणि टाचांनाही बरे करते. ते मृत त्वचा काढून टाकून त्वचेतील निरोगी पेशी वाढवण्याचे काम करते. सोबतच टाचांचा कोरडेपणा दूर करून पायांचे सौंदर्यही परत मिळवून देते.

हेही आहेत प्रभावी उपाय

बादलीत गरम पाणी घेऊन त्यात तीन मोठे चमचे एप्सम मीठ टाका. त्यानंतर त्यात सुमारे अर्धा कप डेटॉल टाका. एप्सम मीठ त्वचेला मुलायम बनवण्याचे काम करते, तर डेटॉल जंतुनाशक असून ते फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य संसर्ग होऊ देत नाही. टाचांना जास्त भेगा पडल्यामुळे बऱ्याचदा संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसा. त्यानंतर शॉवर जेलने पाय अलगद पुसून घ्या.

त्यानंतर त्याच बादलीत पुन्हा पाय टाकून धुवा व नंतर टॉवेलने पुसा. नंतर चांगल्या दर्जाचे लोणी पायांना लावून ५ मिनिटे मालिश करा. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, लोण्यात दाह कमी करणारे घटक असतात. त्यामुळे ते टाचा लाल होणे, भेगा पडल्यामुळे टाचांची होणारी जळजळ दूर करण्यास मदत करतात. असे तुम्ही आठवडयातून दोनदा रात्री झोपताना करा. टाचांना पडलेल्या भेगा निश्चिंतच बऱ्या होतील.

९ टीप्स आनंदी गरोदरपणासाठी

* नसीम अन्सारी कोचर

वर्षानुवर्षांची अशी प्रथा आहे की, महिलेला दिवस जाताच घरातल्या अन्य महिला तिच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेऊ लागतात. जुन्या काळात चणे, गूळ, दूध, खवा, फळे इत्यादींचे सेवन करणे गरोदर महिलेसाठी गरजेचे होते, जेणेकरून तिच्या शरीराला रक्ताची कमतरता भासू नये. परंतु सध्या एकत्र कुटुंब राहिलेली नाहीत. शहर आणि महानगरात महिला केवळ आपल्या नवऱ्यासोबत राहतात, सोबतच नोकरीही करतात. त्यामुळेच स्वयंपाकघरात स्वत:च्या गरोदरपणासाठी पौष्टिक बनवण्याइतका वेळ तिच्याकडे नसतो आणि त्याबाबत तिला माहितीही नसते.

याशिवाय आजकालच्या महिला कमनीय बांध्यासाठी गरजेपेक्षा जास्तच काळजी घेतात. वजन वाढले तर आपण खराब दिसू, अशी भीती त्यांना वाटत असते. त्यामुळेच गरोदर असतानाही पुरेसे खात नाही आणि त्यामुळे त्यांना प्रसूतीवेळी अॅनेमिया म्हणजे रक्तक्षयाचा त्रास जाणवतो.

गरोदरपणात बाळाच्या विकासासाठी शरीर अधिक प्रमाणात रक्त तयार करते. त्यामुळेच तुम्ही या काळात पुरेशा प्रमाणात लोह आणि पौष्टिक अन्न ग्रहण केले नाही तर तुमच्या शरीरात जास्त रक्त तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या लाल पेशींची निर्मिती थांबते. रक्तक्षयामुळे शरीरातील उती आणि भ्रुणापर्यंत ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी शरीरातील रक्त पुरेशा प्रमाणात निरोगी लाल रक्त पेशी बनवू शकत नाही. गरोदरपणात हृदयाला भ्रुणाला आवश्यक पोषण मिळवून देण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते.

गरोदरपणात शरीरातील रक्ताचे प्रमाण ३० ते ५० टक्के वाढते. गर्भावस्थेदरम्यान रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हिमोग्लोबिनच्या पातळीचा समतोल राखण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. लाल रक्त पेशींपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन घेऊन जण्याचे काम हिमोग्लोबिन करते. गरोदरपणात रक्तक्षय होतोच.

आई किंवा सासूने बनवलेले पिठाचे तुपातील आणि खव्याचे लाडू मिळाले नाहीत म्हणून फारसे बिघडत नाही. त्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील त्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा ज्यात लोह जास्त प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन आणि लाल रक्त पेशींचे प्रमाण योग्य रहावे यासाठी लोहयुक्त पदार्थ खाणे गरोदर महिलेसाठी खूपच गरजेचे असते. गरोदर महिला कोणत्या पदार्थांमुळे स्वत:ला आणि होणाऱ्या बाळाला निरोगी ठेवू शकते, हे माहिती करून घेऊया :

पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या लोहाने युक्त असतात. गरोदरपणात या पालेभाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर लोहयुक्त आहाराचा तुम्हाला फायदाच होईल. लोह हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीस मदत करते जे लाल रक्त पेशी तयार करते.

पालक, केळी, ब्रोकली, कोथिंबीर, पुदिना आणि मेथीदाणा हे लोहयुक्त असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे असतात.

सुकामेवा

खजूर आणि अंजिरात लोहाचे प्रमाण खूप जास्त असते जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते. अन्य सुकामेवा जसे की, अक्रोड, किसमिस आणि बदामही खाता येईल. हे सर्व गरोदर महिलेच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करू शकतात. खजूर आणि अक्रोडही रक्त वाढीसाठी उपयुक्त असतात. रात्री ३ अक्रोड पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा.

डाळी

डाळींमध्ये लोह आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. सलाड किंवा सूप केल्यास त्यामध्ये डाळी घाला. मटार, डाळी आणि बीन्समध्ये जीवनसत्त्वे, खनिज, लोह आणि प्रथिने असतात. त्यामुळे यांचा गर्भवती महिला आपल्या आहारात समावेश करू शकतात.

शतावरी

यात मोठया प्रमाणावर लोह असते. तुम्ही गरमागरम शतावरी सूप एक कप पिऊ शकता. यात लोहाचे प्रमाण आणखी जास्त वाढवण्यासाठी तुम्ही तिळाच्या बियांचाही वापर करू शकता.

ताजी फळे

ताजी फळे जसे की, डाळिंब आणि संत्र्यांमुळे हिमोग्लोबिन वाढू शकते. डाळिंबात लोह भरपूर प्रमाणात असते आणि संत्र्यांमध्ये क जीवनसत्त्व असते जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवते आणि हिमोग्लोबिनच्या पातळीतही वाढ होते. किवी, पीच, द्राक्षे आणि पेरूमध्ये मोठया प्रमाणात लोह असते.

फॉलिक अॅसिड

फॉलेट किंवा फॉलिक अॅसिड हे एक प्रकारे ब जीवनसत्त्व आहे, जे सहज मिसळून जाते. हे गर्भावस्थेत भ्रुणाचे न्यूरल ट्यूब दोषापासून रक्षण करण्यासाठी मदत करते. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी हे जीवनसत्त्व महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फॉलिक अॅसिडची गरज भागविण्यासाठी मका, केळी, मोड आलेली कडधान्ये, अवाकॅडो आणि भेंडी खावीत. यात पुरेशा प्रमाणात फॉलिक अॅसिड असते.

स्मूदी आणि बिया

भोपळयाच्या बिया, बदाम आणि सूर्यफुलांच्या बियांमध्येही लोह मोठयाप्रमाणात असते. गर्भवती महिला याचे सेवन करून आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवू शकतात. सफरचंद, बीट आणि गाजराची स्मूदीही फायदेशीर असते.

पूरक आहार

गरोदर महिलेच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वसाधारणपणे डॉक्टर लोहयुक्त पूरक आहार लिहून देतात. तुम्हाला कधी, कोणता आणि किती प्रमाणात लोहयुक्त पूरक आहार घ्यावा लागेल, हेही डॉक्टरच सांगतात.

मोबाईलपासून रहा दूर

गरोदरपणात मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर रहा. गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा. या काळात तुम्ही चांगले साहित्य आणि चांगली पुस्तके वाचू शकता.

 

शरीरावर उन्हाचे ५ परिणाम

* पारूल भटनागर

ऊन आपल्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम करते. सूर्याची किरणे म्हणजे अतिनील किरणांच्या (अल्ट्राव्हायोलेट) संपर्कात आल्यामुळे सन बर्न, उष्माघात, डोळयांना अॅलर्जी, एजिंग इतकेच नव्हे तर स्किन कॅन्सरही होऊ शकतो. चला, याविषयी कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया :

यूव्ही किरणे तीन प्रकारची असतात. यूव्हीएला अल्ट्राव्हायोलेट एजिंग किरण या नावानेही ओळखले जाते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचा सैल होते आणि वयाआधीच वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. यूव्हीबीला अल्ट्राव्हायोलेट बर्निंग किरण या नावाने ओळखले जाते. यामुळे सनबर्न वाढते. तर यूव्हीसीला अल्ट्राव्हायोलेट कॅन्सर किरण असे म्हणतात. यामुळे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे ही किरणे त्वचेचे नुकसान करण्याचे काम करतात. यामुळे त्वचेचे नेमके कसे नुकसान होते, हे जाणून घेऊया :

सनबर्न आणि सनटॅनची समस्या

शरीराला थोडयाफार प्रमाणात उन्हाची गरज असते. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते. हाडे बळकट होतात. पण जेव्हा त्वचा कडाक्याच्या उन्हाच्या संपर्कात येते तेव्हा सनबर्न आणि सनटॅन अशा दोन्ही समस्या निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी सन केअर गरजेचे असते. सनबर्न आणि सनटॅन हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. सनबर्नमुळे त्वचा काळवंडते. रुक्ष होते. तर सनटॅनमुळे त्वचा लाल होते. जळजळल्यासारखे वाटू लागते.

स्किन एजिंग आणि पिग्मेंटेशन

वय वाढू लागल्यावर त्वचेला सुरकुत्यांचा सामना करावाच लागतो, पण उन्हामुळे ही समस्या अधिकच वाढते. जास्त कडक उन्हामुळे त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. यूव्ही किरणे त्वचेतील कोलोजन आणि इलॅस्टिक टिश्यूचे नुकसान करतात. त्यामुळे ती नाजूक होतात आणि पुन्हा आपल्या पूर्वीच्या आकारात येऊ शकत नाहीत. मेलानीन नावाच्या स्किन पिग्मेंटेमुळे आपल्या त्वचेचा रंग मिळतो. ते नॅचरल सनस्क्रीनसारखे काम करते. उन्हामुळे जास्त मेलानीनची निर्मिती होते. यामुळे टॅनिंग वाढते. जेव्हा मेलानीन असमान मात्रेत वाढते तेव्हा पिग्मेंटेशन होते. ते प्रेकल, ब्रेमिशेज व सनस्पॉटच्या रूपात दिसू लागते. यामुळे असमान स्किनटोनची समस्या वाढू शकते.

डोळयात इन्फेक्शनची भीती

उन्हाळा आपल्यासोबत खूप साऱ्या समस्या घेऊन येतो. सूर्याच्या अतिनील किरणांसोबत धूळमातीच्या संपर्कात आल्यामुळे डोळयांची जळजळ, खाज, डोळे लाल होणे अशा समस्या तसेच इन्फेक्शन होते. या किरणांमुळे दृष्टीवर दुष्परिणाम होण्यासह डोळयांच्या पडद्यावरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी थोडया वेळाने डोळे थंड पाण्याने धुवा. डोळे जळजळू लागल्यास ते चोळू नका, तर स्वच्छ कपडयाने पुसा. डोळयांना थंडावा देणारे आयड्रॉप वापरा. बाहेर जाताना गॉगल लावा, जेणेकरून सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळयांचे संरक्षण होऊ शकेल.

उष्माघात

उन्हाळयात खूप घाम येत असल्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे हिट स्ट्रोक म्हणजे उष्माघाताची समस्या निर्माण होते. यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. सेंट्रल डिसिस कंट्रोल आणि प्रिव्हेन्शननुसार उष्माघातामुळे शरीराचे तापमान खूपच वेगाने वाढते. याकडे दुर्लक्ष केल्यास जीवदेखील जाऊ शकतो किंवा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

कसे कराल रक्षण

* उन्हाळयात नेहमी सनस्क्रीन वापरा.

* यूव्हीए आणि यूव्हीबी प्रोटेक्शन करणारेच सनस्क्रीन वापरा.

* घराबाहेर पडताना उन्हापासून रक्षण करणारा गॉगल, छत्रीचा अवश्य वापर करा.

* शरीरातील आर्द्र्रता कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

* कुठल्याही प्रकारची अॅलर्जी झाल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा.

* तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसारच क्रीमची निवड करा.

* दररोज चेहऱ्याला अॅलोव्हेरा जेलने मसाज करा.

* आठवडयातून दोनदा चेहऱ्याला मुलतानी मातीचा पॅक लावा.

* नेहमी बाहेरून आल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा.

स्लिमिंग पिल्सपासून रहा दूर

* पूनम अहमद

आजकाल बारीक दिसण्याचे वेड लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बारीक असणे हीच जणू सौंदर्य आणि हुशारीची ओळख आहे. कमी वेळेत मेहनतीशिवाय बारीक दिसण्याची इच्छा वाढीस लागली आहे. याचे दुष्परिणाम माहीत असूनही लोक तीच चूक करत आहेत जी ठाण्यात राहणाऱ्या २२ वर्षीय मेघनाने केली. मेघना अलीकडेच एका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कामाला लागली होती. जिममध्ये वर्कआऊटपूर्वी तिने डिनिट्रोफेनॉल घेतली आणि अचानक तिची तब्येत बिघडली. तिला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा कितीतरी जास्त होते. तिला श्वास घ्यायला त्रास होता. हृदयाची धडधड खूपच वेगवान होती आणि ब्लडप्रेशर खूपच वाढले होते. त्यामुळेच हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला.

हे औषध ऑनलाईन मिळते आणि यात असलेले आयनोफोरिक हे शरीरातील चयापचय प्रक्रियेचा स्तर वाढवून वजन कमी करते. हे असे एक रासायनिक तत्त्व आहे जे माणसाचा जीव घेऊ शकते. याचा डोस जास्त झाल्यास श्वास घ्यायला त्रास होणे, प्रचंड गरम होणे, हृदयाचे ठोके वाढणे इत्यादी अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.

आता याचा तपास सुरू आहे की, मेघनाने ते औषध कुठून आणि कसे मिळवले? पोलिसांनी जिममध्ये जाऊन तिच्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली.

मेघनाच्या भावाने सांगितले की, ती २ महिन्यांपासून प्रशिक्षक म्हणून जिमला जात होती. ते औषध तिला कुठून मिळाले? बाजारात अशा ब्रँडचे औषध मिळतेच कसे? असे प्रश्न तिच्या भावाने विचारले.

एफडीएच्या आयुक्त पल्लवी यांनी सांगितले की, ‘‘अशा ब्रँडची औषधे ऑनलाईन सहज मिळत असल्याने हा चिंतेचा विषय आहे. अनेकदा अशी औषधे एखाद्या वेगळया नावाने ऑनलाईन मिळतात. अशा ब्रँडची औषधे विकणाऱ्या आणि त्याची जाहिरात करणाऱ्या ६२ ठिकाणांवर आम्ही कारवाई केली आहे. आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, मेघनाला ते औषध कुठून मिळाले.’’

जीवघेण्या ठरत आहेत बारीक होण्याच्या गोळया

आजकाल लोक आपले आरोग्य आणि दिसण्याकडे जास्तच लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या स्लिमिंग पिल्स म्हणजे बारीक होण्याच्या गोळया खूपच लोकप्रिय होत चालल्या आहेत. याचे दुष्परिणाम माहीत करून घेण्यापूर्वीच अनेज जण या गोळया खात आहेत. संतुलित आहार, पुरेसा व्यायाम, निरोगी जीवनशैलीकडे लक्ष देण्यापेक्षा अशा गोळया खाणे त्यांना जास्त सोपे वाटू लागले आहे.

रिमाचे वजन लहानपणापासूनच खूप जास्त होते. एक ब्रेकअप आणि एका शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच कारणांमुळे वजन आणखी वाढले. तिने सांगितले की, ‘‘माझ्या एका मैत्रिणीने डेकसाप्रिन गोळी खाण्याचा सल्ला दिला. मला ती इंटरनेटवर मिळाली. मी ती खायला सुरुवात केली. तिचे साईड इफेक्ट लगेचच जाणवू लागले. मला खूप घाम यायचा. त्यानंतर अचानक थंडी वाजू लागायची. हृदय जोरजोरात धडधडू लागायचे. कामावर गेल्यानंतर हात थरथर कापायचे. मात्र माझे वजन कमी होऊ लागले होते. त्यामुळे मी खुश होते. त्यानंतर सहाव्या दिवशी माझ्या छातीत दुखू लागले. हृदय रोगाचा झटका येईल, असे मला वाटू लागले. मी त्याच वेळी घशात हात घालून गोळी बाहेर काढली. डेकसाप्रिनवर यूके आणि नेदरलँडमध्ये बंदी घालण्यात आली आहे.’’

यात असे घटक आहेत ज्यामुळे मानसिक असंतुलन, हृदय रोगाचा झटका, पक्षाघात होऊ शकतो. २०१२ मध्ये ३० वर्षीय लंडन मॅरेथॉनचा धावपटू क्लेअर्स  स्क्वायर्सचा मृत्यू त्यावेळी झाला ज्यावेळी तो अंतिम रेषेपासून फक्त १ मैल दूर होता. २०१४ मध्ये डच वैज्ञानिकांनी सांगितले की, त्या धावपटूच्या आहारात सिंथेटिक घटक सापडले होते.

फसव्या जाहिरातींचे जाळे

योग्य आहार, पुरेसा व्यायाम, मेहनत आणि संयम राखल्यास वजन कमी करता येते, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तरीही दरवर्षी हजारो लोक तात्काळ वजन कमी होण्याचा चमत्कार आपल्या आयुष्यात घडेल या आशेने इंटरनेटवरून बारीक होण्याच्या गोळया बेकायदेशीरपणे खरेदी करतात. रात्री उशिरा टेलिमार्केटिंगमध्ये अनेकदा एक बारीक मुलगी आपली कंबर आणि एक मुलगा त्याचे अॅप्स दाखवत असतो आणि बारीक होण्याच्या गोळयांमुळे हे शक्य झाले, असे दोघेही सांगतात. या गोळयांचे एक कटू सत्य असे की, त्या हायड्रोक्सिल पिल्स आहेत. वजन कमी करण्यासाठी त्या जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सेवनामुळे भूक मंदावते. चरबी कमी होते. यामुळे आपोआपच वजन कमी होऊ लागते. पण याचे साईड इफेक्ट खूपच धोकादायक आहेत.

आहारतज्ज्ञ डॉक्टर मानसी यांच्या मते, यामुळे यकृत आणि स्वादुपिंड खराब होऊ शकते. चिंता, झोप न येणे, मासिक पाळीच्या समस्या, हृदयाची धडधड वाढणे, अशा समस्याही निर्माण होतात. भलेही त्या आयुर्वेदिक किंवा हरबल असल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

५२ वर्षीय सुनीताचे वजन प्रमाणापलीकडे वाढले होते. त्यांनी सांगितले की, ‘‘लठ्ठपणामुळे कँसर होऊ शकतो, असे मी टीव्हीवर पाहिले होते. मी घाबरले. काहीतरी करायला हवे असे मला वाटले. मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सांगितले की, तुमचे जेवण कमी आहे. फक्त तुम्ही भरपूर व्यायाम करायला हवा. माझे समाधान झाले नाही. मला झटपट बारीक व्हायचे होते. त्यामुळे मी गूगलवर ‘स्लिमिंग पिल्स’ असे सर्च केले. बऱ्याच साईट्स दिसू लागल्या. एका साईटवर एक डॉक्टर गळयात स्टेथस्कोप घालून समजावत होते.

‘‘मला वाटले हीच साईट योग्य आहे. लोक बनावट वेबसाईटवर हे सर्व दाखवतात, याची मला कल्पना नव्हती. मी लगेच ऑर्डर देऊन त्या गोळया मागवल्या. गोळया खाऊन फक्त ३ आठवडेच झाले होते. अचानक माझी तब्येत बिघडली. मी घरी एकटीच होते. मुले शाळेत गेली होती. माझे पाय लटपटू लागले. जोरात चक्कर आली. मी मरणार, असे मला वाटू लागले. हे सर्व त्या गोळयांचे साईड इफेक्ट होते.’’

फिगर बनवण्याचे धोकादायक उपाय

चांगली फिगर किंवा बांधा हवा, असे दडपण महिलांवर असते. आता पुरुषांनाही असेच वाटू लागले आहे. कपडयांच्या एका मोठया ब्रँडच्या दुकानात अंजली आणि रवी दोघेही काम करत होते. अंजलीसारखे बारीक आणि सुंदर दिसावे, असे रवीलाही वाटत होते. तिथे येणाऱ्या एका मॉडेलच्या सल्ल्यानुसार दोघांनी इंटरनेटवरून डाएट पिल्स खरेदी केल्या.

काहीच दिवसात शरीरातील चयापचय प्रक्रियेची पातळी वेगाने वाढल्यामुळे रवीची तब्येत अचानक इतकी बिघडली की, तो यातून वाचू शकला नाही.

फेब्रुवारी २०२० मध्ये एफडीएने यूएसच्या मार्केटमधून उत्पादक आणि वितरकांना बेल्विक देऊ नका असे सांगितले, कारण बेल्विकमुळे कॅन्सरचे रुग्ण वाढू लागले होते.

बारीक होण्याच्या गोळया म्हणजे एखादी जादू किंवा चमत्कार नाही. म्हणूनच त्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

अशा गोळया खाऊन स्वत:चे आयुष्य धोक्यात घालू नका. बारीक होणे किंवा बारीकच राहणे अवघड नाही. त्यासाठी संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे गरजेचे आहे.

लक्षात ठेवा, बारीक राहिल्यामुळेच तुम्ही यशस्वी, सुंदर आणि सुखी व्हाल, असे मुळीच नाही. वजन जास्त असेल तर संयमाने रोज व्यायाम करून ते कमी करण्याचा प्रयत्न करा. मेहनत कधीच वाया जात नाही. बारीक होण्यासाठी कमी प्रमाणात खाणे, प्रोटीन घेणे, पालेभाज्या खाणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. बारीक होण्याच्या गोळयांपासून दूरच रहा.

महिला बनत आहेत थायरॉईडच्या शिकार

* प्रतिनिधी

अचानक वजन वाढणे, केस गरजेपेक्षा जास्त गळू लागणे इत्यादी लक्षणे सांगतात की, थायरॉईडची समस्या वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत, तरुण मुलींपासून ते महिलांपर्यंत सर्वच वेगाने याच्या शिकार ठरत आहेत. एका संशोधनानुसार, ८ पैकी १ महिला या समस्येने त्रस्त आहे.

थायरॉईडची ग्रंथी ही गळयासमोर फुलपाखराच्या आकाराएवढी ग्रंथी असते जी हार्मोन्स तयार करते आणि हे हार्मोन्स शरीराच्या वेगवेगळया अवयवांना त्यांचे काम योग्य प्रकारे करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. ते शरीराच्या मेटाबॉलिक म्हणजे चयापचय प्रक्रियेसह हृदय तसेच पचन संबंधी यंत्रणा सुरळीत ठेवतात. मेंदूचा विकास, मांसपेशींवर नियंत्रण आणि हाडे मजबूत राखणेही त्यांच्यामुळेच शक्य होते. थायरॉइडमधील बिघाडामुळे थायरॉइडच्या ग्रंथीच्या कामावर दुष्परिणाम होतो. यामुळे चयापचय प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स तयार करण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो.

महिलांनाच याचा जास्त त्रास का?

थायरॉईडमध्ये होणारा बिघाड ही जास्त करून आपोआपच बरी होणारी प्रक्रिया असते. यात रुग्णाची प्रति सुरक्षा प्रणाली हल्ला करून थायरॉइडच्या ग्रंथी नष्ट करते. विविध संशोधनांनुसार ऑटो इम्युन डिसिस जसे की, सिलिएक डिसिस, डायबिटीस मेलिटस टाइप, इम्प्लिमेंटरी बोवेल डिजिज, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि संधीवाताचा त्रास महिलांना सर्वसामान्यपणे होतोच.

हे आजार शोधून त्यावर उपचार करण्यासाठी यामुळे उशीर होतो कारण, याची वेगवेगळी लक्षणे शोधणे कठीण असते. ऑटो इम्युन आजार आयोडिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. गर्भावस्थेत आयोडिनची जास्त कमतरता भासते. याच्या कमतरतेमुळे थायरॉईड हार्मोन्सची पातळी खालावते.

थायरॉईडमधील बिघाडाचे किस्से

हायपोथायरॉडिज्म, हायपरथायरॉडिज्म, थायरॉईटिस, थायराईड कॅन्सरसारखे आजार पुरुष आणि महिला दोघांनाही त्रासदायक ठरतात. यातील हायपोथायरॉडिज्म, हायपरथायरॉडिज्म हे आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १० पट अधिक होतात.

हायपोथायरॉडिज्म हा एक प्रकारचा थायरॉईडचा आजार आहे. हा आजार तेव्हा होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथीची सक्रियता कमी होते आणि सर्वसाधारण हार्मोन्सच्या तुलनेत कमी हार्मोन्स तयार होतात. यामुळे शरीरातील हार्मोन्स आणि चयापचय प्रक्रियेचे संतुलन बिघडते. महिलांमधील हायपोथायरॉडिज्म होण्यामागील एक सर्वसामान्य कारण म्हणजे ऑटो इम्युन डिसिस. याला हॅशिमोटोज डिसिस असे म्हणतात. यात अँटीबॉडीज हळूहळू थायरॉइडला लक्ष्य करते आणि थायरॉईड हार्मोन्स बनवण्याची क्षमता नष्ट करते.

हायपरथायरॉडिज्म हा एक प्रकारचा थायरॉइडचा बिघाड आहे. हा बिघाड तेव्हा होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त सक्त्रिय होतात आणि गरजेपेक्षा जास्त हार्मोन्सची निर्मिती करतात. हार्मोन्स शरीरातील चयापचय प्रक्त्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

प्राथमिक लक्षणे

बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात थायरॉईडमधील बिघाड लक्षात येत नाही, कारण याची लक्षणे स्पष्ट नसतात. यामुळे त्याला वांझपणा, लिपिड डिसऑर्डर, अॅनिमिया किंवा मानसिक तणाव समजण्याची चूक केली जाते. लक्षणे उशिराने लक्षात येतात. तोपर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई करणे अशक्य होते.

हायपोथायरॉडिज्मच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असतो : थकवा, कोरडी त्वचा, मांसपेशी आखडणे, कफ, थंडी सहन न होणे, सुजलेल्या पापण्या, वजन नियंत्रणाबाहेर वाढणे, मासिक पाळीतील अनियमितता.

हायपरथायरॉडिज्मच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असतो : भीती वाटणे, झोप न लागणे, वजन कमी होणे, हातांना घाम येणे, हृदयाची वेगवान आणि अनियमित धडधड, डोळे जड होणे, डोळयांच्या पापण्या न मिटता एकटक पाहाणे, दृष्टिदोष, भरपूर भूख लागणे, पोट बिघडणे, गरमी सहन न होणे.

थायरॉईडच्या बिघाडासाठी जबाबदार घटक : थायरॉईडचा आनुवांशिक आजार, ऑटोइम्युन स्थिती, गळयात रेडिएशन असणे, थायरॉइडची शस्त्रक्रिया, थायरॉईड वाढणे.

निर्बंध

थायरॉइडमधील बिघाड हा जीवनशैलीमुळे झालेला बिघाड नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात आयोडिनचे सेवन करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करण्याची गरज नसते. भारत सरकारने युनिव्हर्सल सॉल्ट आयोडिनेशनला मान्यता दिल्यामुळे आता आयोडाईज्ड मिठात पुरेशा प्रमाणात आयोडिन असते.

थायरॉइडचा बिघाड वेळेवर लक्षात आल्यास आणि योग्य उपचार केल्यास गंभीर परिणाम रोखणे शक्य होते. महिलांनी वर्षातून एकदा थायरॉईड ग्रंथींची तपासणी करून घ्यायला हवी, जेणेकरून आजार लवकर लक्षात येईल आणि वेळीच उपचार करता येईल.

Winter 2022 : नवीन वर्षामध्ये तुमच्या आरोग्याची अशी काळजी घ्या

* गृहशोभिका टीम

हिवाळ्यातील थंड हवा आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. सतत बदलणाऱ्या ऋतूंमध्ये शरीराला हवामानाशी जुळवून घेण्यासही थोडा वेळ लागतो. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला काही महत्त्वाच्या हेल्थ टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकाल.

व्यायाम करा

या ऋतूत व्यायाम करणे आवश्यक आहे. आपले शरीर थोडे हलवा जेणेकरून शरीर लवचिक राहील. व्यायामशाळेत जाणे हा देखील एक चांगला पर्याय असेल.

  1. भरपूर पाणी प्या

थंडीमुळे शरीरातून पाणी बाहेर पडत नाही, त्यामुळे जास्त वेळ तहान लागत नाही. शरीराच्या आत स्वच्छतेसाठी, दिवसभरात किमान 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता.

  1. दररोज शॉवर

एका संशोधनातून असे समोर आले आहे की, हिवाळ्यात शरीरातील आर्द्रता संपुष्टात येऊ नये म्हणून 10 मिनिटे आंघोळ केली पाहिजे. साबणाने खूप काळजी घ्या. शरीराला ओलावा देणारा साबण वापरा.

  1. हिरव्या भाज्या खा

या ऋतूत हिरव्या भाज्यांचे भरपूर सेवन करा. ते तुमच्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें