विस्तवाशी खेळ

कथा * रवी चांदवडकर

रात्रीचे बारा वाजले तरी स्वातीच्या डोळ्यांत झोप नव्हती. शेजारी झोपलेला नवरा मजेत घोरत होता. दिवसभर दमल्यावरही स्वाती मात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत झोपेची आराधना करत होती. पुन:पुन्हा तिच्या डोळ्यांपुढे तो दुपारचा प्रसंग येत होता. ज्याला ती सहज, हलकाफुलका खेळ समजत होती तो साक्षात विस्तवाशी खेळ होता, या जाणिवेने ती हवालदिल झाली होती. पुरुषांशी मोकळेपणाने बोलणं, हलकेफुलके विनोद करणं, फ्लर्टिंग ही तिच्या मते फारसं गंभीरपणे घेण्याची बाब नव्हती.

स्वाती मैत्रिणींना, नातलगांना नेहमी सांगायची, ‘‘मार्केटमध्ये माझी इतकी ओळख आहे की कोणतीही वस्तू मला स्पेशल डिस्काउंटवर मिळते.’’

स्वाती आपल्या माहेरीही वहिनींना, बहिणींना सांगायची, ‘‘आज मी वेस्टर्न ड्रेस घेतला. खूप स्वस्त पडला मला. डिझायनर साडी घेतली दीड हजाराची, साडी मला फक्त नऊशेला मिळाली, हिऱ्याची अंगठी मैत्रिणींकडून ऑर्डर देऊन करवून घेतली. दोन लाखाची अंगठी मला दीड लाखात पडली.’’

माहेरच्या लोकांच्या नजरेत स्वातीविषयी हेवा, अभिमान अन् कुतूहल असायचं. तिची हुशारी, बारगेनिंग पॉवर अन् वाक्पटुता सगळ्यांना ठाऊक होती. कुणाला काही घ्यायचं असलं तर ते स्वातीला फोन करायचे अन् स्वाती त्यांना हवी असलेली वस्तू योग्य त्या किमतीत मिळवून द्यायची.

आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, शिकलेली, चतुर स्वाती लहानपणापासूनच खरेदी करण्यात हुशार होती. तिला खरेदी करायला फार आवडायचं. एखाद्याला वाचन आवडतं, कुणाला इतर काही आवडतं तसं स्वातीला खरेदी करायला आवडायचं. मोठमोठ्या रकमेच्या वस्तूही ती घासाघीस करून कमी किमतीत अन् थोडक्या वेळात खरेदी करायची. सासरी, माहेरी सर्वत्र तिचं कौतुक व्हायचं.

स्वातीचं माहेर तसं मध्यमवर्गीय. त्यातही निम्न मध्यमवर्गीय. पण लग्नं झालं ते मात्र एका व्यावसायिक घराण्यातल्या अत्यंत श्रीमंत कुटुंबातल्या मुलाशी. कोट्यधीशांच्या घरात येऊन इथले रीतिरिवाज तिने शिकून घेतले पण मुळची काटकसरी वृत्ती मात्र सोडली नाही. घरखर्चात काटकसर करून पैसे वाचवणं अन् त्यातून मनसोक्त खरेदी करणं तिला फार आवडायचं. नवरा भरपूर पैसे हातात देत होता. शिवाय त्याच्या पाकिटातून पैसे लांबवणं हाही स्वातीचा लाडका उद्योग होता. शिकलेल्या, संस्कारवान अन् समजूतदार स्वातीला एक गोष्ट चांगलीच लक्षात आली होती…पुरुषांना काय आवडतं, त्यांचा ‘वीक पॉइंट’ काय असतो, त्यांच्याकडून कमी भावात वस्तू कशी खरेदी करायची हे गणित तिला बरोबर जमलं होतं. ज्या दुकानात किंवा शोरूममध्ये पुरुषमालक असेल तिथेच ती खरेदीला जायची. सेल्समन, सेल्सगर्ल्सना ती म्हणायची, ‘‘तुम्ही फक्त सामान दाखवा. मालकांशी बोलून मी किंमत ठरवीन.’’

खरेदी झाल्यावर हिशेब करताना ती शेठच्या डोळ्यांत डोळे घालून लाडिकपणे म्हणायची, ‘‘भाऊ, किंमत बरोबर लावायची हं! आजची नाही, गेली दहा वर्षं तुमची ग्राहक आहे मी. तुमच्या दुकानाची जुनी कस्टमर.’’

‘‘वहिनी, किंमत जास्त लावणार नाही. काळजी करू नका,’’ दुकानमालक म्हणायचा.

‘‘नाही हो, तुम्ही चक्क जास्त पैसे लावलेत. तुमच्या दुकानावर मला नेहमीच स्पेशल डिस्काउंट मिळतो.’’ बोलता बोलता स्वाती सहजच केल्यासारखा त्याच्या हाताला स्पर्श करायची. ‘‘भाऊ, हे बघा, तुम्ही माझ्या धाकट्या दिरासारखे आहात. दीरभावजयीच्या नात्यात असे रुपयेपैशांचे हिशेब कशाला आणता?’’

बहुधा दुकानदार स्वातीच्या गोड गोड गोष्टींना भुलायचा अन् १५ टक्के, २० टक्के डिस्काउंट द्यायचे.

एका ज्वेलरशी तर स्वातीने चक्क भावजी मेहुणीचं नातं जोडलं होतं. दागिने हा बहुतेक बायकांचा वीक पॉइंट असतो. स्वातीचाही होता. स्वाती खूपदा त्या ज्वेलरच्या दुकानांत जायची. काय काय नवी डिझाइन्स आली आहेत हे नुसतं बघायला गेली, तरी काहीतरी त्यातलं आवडायचं. मग ‘जिजू अन् साली’च्या नात्यात चेष्टामस्करी सुरू व्हायची.

‘‘भावोजी, मी तुमची मेहुणी आहे. तुम्हाला हिंदीतली ती म्हण ठाऊक आहे ना, ‘साली आधी घरवाली…’ माझा हक्कच आहे तुमच्यावर, मी एवढीच किंमत देणार.’’

स्वातीच्या स्पर्शाने सुखावलेला ज्वेलर मिळालेली किंमत मुकाट घ्यायचा. त्याच्या मनात मात्र हे स्पर्शसुख अधिक मिळवण्याचं प्लॅनिंग सुरू असायचं. अर्थात्  स्वाती चतुर होती. ती पैसे दिले की ताबडतोब निघायची. हाती लागणं दूरच होतं.

त्या दिवशी तिच्या वहिनीचा फोन आला. स्वातीला भाचीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करायचे होते. स्वाती खरेदी करतेय म्हटल्यावर ती ‘स्वस्त आणि मस्त’ असणार हे वहिनी जाणून होती.

स्वातीने घरून निघण्याआधीच ज्वेलरला फोन करून सांगितलं होतं, ‘‘माझ्या भाचीचं लग्न आहे. मी खरेदीसाठी येतेय. तुम्ही चांगली चांगली निवडक डिझाइन्स आधीच बाजूला काढून ठेवा. माझ्याकडे फार वेळ नाहीए.’’

दुकानदार अगदी नाटकीपणाने म्हणाला, ‘‘आपला हुकूम सर आँखों पर, आप आइए तो साली साहिबा. तुमच्यासाठी सगळं तयार ठेवतो.’’

ज्वेलरचं हे दुकान म्हणजे फार मोठी शोरूम नव्हती. पण तो ज्वेलर स्वत: उत्तम कारागीर होता. ऑडर्स घेऊन दागिने तयार करायचा. शहराच्या एका कॉलनीत त्याचं दुकान होतं. काही खास गिऱ्हाइकांसाठी तो ऑर्डर केलेले दागिने तिथे ठेवायचा. तिथूनच खरेदीविक्री चालायची. ऑर्डर केलेला माल घ्यायला, तयार मालातून खरेदी करायला अन् नवी ऑर्डर द्यायला गिऱ्हाइकं येतजात असायची. स्वातीच्या एका मैत्रिणीने या ज्वेलरची अन् स्वातीची ओळख करून दिली होती. पण त्या मैत्रिणीलाही हा ज्वेलर स्वातीला कमी किमतीत दागिने कसे देतो हे कोडंच होतं. मैत्रिणीने त्याच्याकडे कधी न बघितलेली डिझाइन्स स्वातीने त्याच्याकडून डिस्काउंटवर मिळवली होती.

‘‘भावोजी, काही वेगळी डिझाइन्स दाखवा ना? ही तर सगळी गेल्या वेळी दाखवलेलीच आहेत.’’ ज्वेलरच्या डोळ्यांत थेट बघत स्वातीने म्हटलं.

ज्वेलरच्या डोळ्यांत काही तरी वेगळी चमक होती. तो तसा नॉर्मल दिसण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वातीने ज्वेलरच्या हातावर हळूच हात ठेवला. मग त्याच्या दंडाला हळूच स्पर्श केला. त्या स्पर्शाने ज्वेलर बेचैन झाला. तोही अधूनमधून स्वातीच्या बोटांना, मनगटाला, हाताला स्पर्श करू लागला. स्वातीला ते खटकलं. तरीही स्पेशल डिस्काउंट घ्यायचा आहे म्हटल्यावर तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

आज दुकानात ग्राहक नव्हतेच अन् एरवी असणारी पाचसात हेल्पर मुलंही दिसत नव्हती. फक्त एकच मुलगा होता. ज्वेलरने त्या मुलाला एक यादी दिली अन् हे सामान बाजारातून आणून टाक म्हणून सांगितलं. ‘‘अन् हे बघ, जाण्याआधी फ्रीजमधून कोल्ड्रिंकच्या दोन बाटल्या काढून उघडून आणून दे, मग जा,’’

दुकानदाराच्या ऑर्डरप्रमाणे मुलगा काम करू लागला.

‘‘नवी डिझाइन्स दाखवा ना?’’ स्वातीने लाडिकपणे म्हटलं.

‘‘दाखवतो ना, कालच आलेली आहेत. केवळ तुमच्यासाठीच वेगळी काढून ठेवली आहेत.’’

‘‘अय्या? खरंच?’’ स्वाती आनंदून बोलली.

‘‘एक ऐकता का? तुम्ही आतल्या केबिनमध्ये या. कारण सगळा माल बाहेर काढून ठेवणं जरा जोखिमीचं असतं अन् आता तर तो पोरगा हेल्परही नाहीए मदतीला.’’

मुलगा कोल्ड्रिंक देऊन निघून गेला होता. आता दुकानात फक्त स्वाती अन् दुकानाचा मालक दोघंच होती. एक क्षणभर स्वातीला भीती स्पर्शून गेली. यापूर्वी इतकी एकटी ती कधीच कोणत्याही दुकानात नव्हती. दुकानदार आपला गैरफायदा घेईल का? तिला तसं काही नको होतं. थोडं लाडिक बोलणं, थोडा हाताबोटांवर स्पर्श एवढ्यावरच तिने डिस्काउंट मिळवले होते. आजही तसंच घडायला हवं होतं. पण तिच्या छातीत धडधडू लागलं. लवकर खरेदी करून बाहेर पडायला हवं. आतला आवाज सांगत होता. धाडस करून ती आतल्या केबिनमध्ये शिरली. आपण अगदी नॉर्मल आहोत हे दाखवण्यासाठी म्हणाली, ‘‘जिजाजी, आज काय झालंय? असे उदास का आहात?’’

‘‘छे:छे: तसं काहीच नाहीए.’’

‘‘काही तरी आहे नक्कीच! मला नाही सांगणार?’’

‘‘तुम्ही नेकलेस बघा…बघता बघता बोलता येईल.’’

स्वाती दिसायला सुंदर होती. खास मेकअप अन् दागिने यामुळे रूप अधिकच खुललं होतं. ज्वेलर एव्हाना चांगलाच विचलित झाला होता. त्याने एकदम धाडस दाखवत स्वातीच्या हाताला स्पर्श केला. स्वाती दचकली, पण, ठीक आहे, नुसत्या स्पर्शाने काय होतंय म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

स्वातीच्या या वागण्याने दुकानदाराचं धाडस वाढलं. तो चेकाळलाच. त्याने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढली.

स्वाती घाबरली, हात सोडवून घेत जरबेने म्हणाली, ‘‘हे काय करताय?’’

ज्वेलरने काही न बोलता पुन्हा तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. आता मात्र स्वाती घाबरली. त्याचं धाडस बघून चकित झाली. आतापर्यंत ती स्वत:च्या फायद्यासाठी पुरुषांना खेळवत होती. पण हा खेळ चांगलाच महागात पडत होता. तिने क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या हातातल्या पर्सचा दमका त्याच्या तोंडावर मारला. दुकानदार हेलपाटला. त्याच्या हातातून स्वातीचा हात सुटला. आता स्वातीने दोन्ही हातांनी त्याला थोबाडायला सुरूवात केली अन् त्याला धक्का दिला. पटकन् आपली पर्स उचलली. धावतच ती केबिनबाहेर अन् मग दुकानाबाहेर आली. आपल्या गाडीत बसली. संताप अन् अपमानाने चेहरा लाल झाला होता. शरीर थरथरत होतं. पटकन् कार स्टार्ट करून तिथून स्वाती निघाली ती सरळ घरीच आली. मनात विचारांचं थैमान होतं. स्वत:चाच राग येत होता. थोडक्यात अनर्थ टळला होता. काहीही वाईट घडू शकलं असतं.

इतकी वर्षं स्वाती ज्याला हलकाफुलका मजेदार खेळ समजत आली होती तो खेळ विस्तवाशीच होता, हे तिला कळलं होतं.

विध्वंस

कथा * राधिका साठे

आता हळूहळू सगळंच पूर्वपदावर येऊ लागलं होतं. गेला आठवडाभर ज्या ऑफिसमधून कामं बंद पडली होती, ती ऑफिसं आता सुरू झाली होती. रस्त्यांवरून सुसाट वेगानं धावणाऱ्या गाड्या रडत-खडत, उखडलेल्या, खचलेल्या रस्त्यांवरून चालू लागल्या होत्या. रस्त्याच्या कडेला हॉकर्सनी पुन्हा आपली दुकानं मांडायला सुरूवात केली होती. रोज मजूरी करून पोट भरणारे मजूर आणि घरकाम करणाऱ्या मोलकरणीही पुन्हा रस्त्यांवर दिसू लागल्या होत्या.

गेल्या आठवड्यात चेन्नईत चक्रीवादळानं केलेला विध्वंस सगळीकडे आपली छाप ठेवून होता. अजूनही अनेक भागांमधलं पाणी ओसरलं नव्हतं. खोलगट भागातल्या वस्त्या अजूनही पाण्याखाली होत्या. एयरपोर्ट अजून सुरू झाला नव्हता. मधल्या काळात रस्त्यांवर कंबरभर पाणी होतं. नेटवर्क बंद होतं. फोन, वीज, जीवनावश्यक वस्तू काही म्हणता काहीच नव्हतं. गाड्यांच्या इंजिनात पाणी भरल्यामुळे लोक गाड्या तिथंच टाकून जीव वाचवून पळाले होते. काही ऑफिसमधून सायंकाळी निघालेले लोक कसेबसे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी पोहोचू शकले होते. कॉलेज, होस्टेल्स आणि युनिव्हसिर्टीत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना लष्कराच्या मदतीनं बाहेर काढलं गेलं.

चेन्नई तसंही समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं शहर आहे. इथं अनेक सरोवरंही आहेत, पण त्याच्यावर अतिक्रमणं करून रस्ते आणि बिल्डिंगांची बांधकामं उभी केली गेली. या सात दिवसात त्या सरोवरांनी जणू आक्रोश करून आपला कोंडून घातलेला श्वास मोकळा केला असावा असं सगळं दृष्य दिसत होतं. शहराची पार दुर्दशा झाली होती.

गरीबांच्या वस्त्या झोपडपट्ट्या खोलगट भागात असल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच वाईट होती. कुठंतरी कशीबशी रात्र काढल्यावर सकाळी उपाशी पोराबाळांचा अन्नासाठी अक्रोश सुरू झाल्यावर त्यांनी समोर दिसलेल्या दुकानावर हल्लाच चढवला. भूक माणसाला चोर आणि आक्रमक बनवते.

रात्रीचे अकरा वाजले होते. जिथं जागा मिळेल तिथं लोक जीव वाचवण्यासाठी उभे होते. पाऊस कोसळत होता अन् सगळीकडे पाणी तुंबायला सुरूवात झाली होती. ऑफिसातून पायी चालत निघालेली रिया पाऊस पाण्यात अडकली होती. एका स्टोअर्सच्या पार्किंगला ती कशीबशी उभी होती. अजून काही लोक तिथं होते. तेवढ्यात दारू प्यायलेले काही तरूण तिथं आले. तरूण मुलगी बघून ते काही बाही बरळायला लागले. इथं आपण सुरक्षित नाही हे रियाला कळलं. पण तिथून अजून कुठं निघून जाणं तिला शक्यही नव्हतं. तिथं असलेली इतर माणसंही हे सगळं कळून काहीच न कळल्याचा आव आणून उभी होती. कारण दारू ढोसलेल्या गुंडांशी लढणं त्यांना शक्य नव्हतं. कोसळणारा पाऊस, उसळणारा समुद्र आणि समोर हे मानवी देहाचे लांडगे…रिया फार घाबरली होती.

आता त्या मुलांपैकी एक तर रियाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. रियानं स्वत:ला अधिकच आक्रसून घेतलं. ती आकाशच्या जवळ सरकली.

गर्दीत उभ्या असलेल्या आकाशला रियाची कुचंबणा कळली. तो त्या मवाल्यांना म्हणाला, ‘‘भाऊ, का त्रास देताय तुम्ही यांना. आपणच या परिस्थितीमुळे त्रस्त आहोत…आणि तुम्ही एका असहाय मुलीला त्रास का देत आहात?’’

एवढं बोलायचा अवकाश…त्या पोरांची टाळकी सटकलीच! एक जण बोलला, ‘‘तू कोण लागतोस रे हिचा?  आणि कोण आहे तुझी? फार काळजी घेतो आहेस तिची?’’ मग त्यानं चक्क तिला हातच लावला, वर निर्लज्जपणे म्हणाला, ‘‘हात लावल्यानं झिजणार आहे का ती? बोल, काय करशील? अजून हात लावेन…मिठीत घेईन…बघूया काय करतोस ते?’’

इतके लोक होते तिथं, पण जिवाच्या भीतिनं कुणी एक समोर येईना. सगळे गुपचुप उभे होते. मनातून सगळेच घाबरलेले होते.

रिया खूपच घाबरली. ती थरथर कापत होती. आकाशच्या मागे दडून उभी राहिली. तोच तिचा एकमेव आधार होता.  आता तर त्या बेवड्यांना ऊतच आला. ते आणखी चेकाळले.

घाबरलेल्या रियाला धीर देत आकाशनं म्हटलं, ‘‘तुम्ही घाबरू नका. मी आहे तोवर तुम्ही सुरक्षित आहात.’’

रियाला रडू फुटलं, त्यातल्या एकानं आता आकाशवर हल्ला चढवला. आकाश पूर्ण शक्तिनिशी त्याचा प्रतिकार करू लागला.

तेवढ्यात गर्दीतले काही लोक आकाशच्या मदतीला धावले. काहींनी रियाभोवती कडं करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आकाशला मदत मिळाल्यामुळे आता त्या दारूड्यांना ही लढाई जड जात होती. त्याच्यामुळे आज त्यांची शिकार हातातून निसटल्याचा संताप आता त्यांना अनावर झाला होता.

ते अर्वाच्च शिव्या देत होते. तेवढ्यात एकानं सुरा काढला अन् आकाशच्या छातीवर सपासप वार केले. तेवढ्यात लष्कराचे जवान तिथं पोहोचले अन् त्या गुंडांनी पोबारा केला. सुरीहल्ला बघून गर्दीतले लोक अवाक्च झाले. जवानांनी ताबडतोब नावेत घालून आकाशला इस्पितळात हलवलं. पण फार जास्त रक्त वाहून गेल्यामुळे आकाशची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आकाश मुळचा मुंबईचा. त्याचं कुटुंब मुंबईतच होतं. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. मुंबईच्या ऑफिसनं सहा महिन्यांसाठी त्याला चेन्नईला पाठवलं होतं. मी ही त्याच कंपनीत काम करत असल्यामुळे आमची ओळख होती. कंपनीत बातमी आली अन् आम्ही सगळेच प्रथम अवाक् झालो. खूप हळहळ वाटली. कंपनीतल्या आणखी एका सहकाऱ्यासोबत मी मुंबईला त्याच्या घरी भेटायला गेले. कुठल्या तोंडानं अन् कोणत्या शब्दांत मी त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करणार होते.

मुंबईला आकाशच्या घरात हाहाकार उडाला होता. मुलं केविळवाणी कोपऱ्यात रडत बसली होती अन् त्याची तरूण बायको तर पार उध्वस्त झाली होती. तिची स्थिती बघवत नव्हती. मी मनातल्या मनात विचार करत होते, चांगल्या कामाचं खरं तर बक्षीस मिळतं मग आकाशला ते का मिळालं नाही? त्याला व त्याच्या कुटुंबाला कुठल्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा मिळाली? एका असहाय मुलीला गुंडापासून वाचवण्याचं हे बक्षिस? अखेरीस का?

दगडालाही पाझर फुटेल असा आकांत त्या घरात चालला होता. त्याच्या पत्नीच्या अश्रूंमध्ये सगळं शहर वाहून जाईल असं वाटत होतं. चेन्नईतलं लोकजीवन आता हळूहळू मार्गावर येत होतं. पण मुंबईतल्या आकाशच्या घराची परिस्थिती कधी अन् कशी बदलणार होती? चेन्नईतल्या गुदमरलेल्या सरोवरांनी आपला हक्क हाहाकार माजवून मिळवला होता. पण आकाशची बायको कुणाजवळ हक्क मागणार? तिच्या झालेल्या नुकसानांची भरपाई कोण, कशी करणार? पत्नीला तिचा पती आणि मुलांना त्यांचा पिता परत मिळू शकेल का?

माझिया प्रियाला

कथा * अनुजा कुलकर्णी

निशा सधन कुटुंबात वाढलेली एकुलती एक लाडाची मुलगी. त्रिकोणी कुटुंब एकदम सुखी होते. आई बाबा दोघांची आवडती होती अनिशा. एकुलती एक असल्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीला नकार मिळाला नव्हता. तिने काही बोलायचा अवकाश, लागलीच हवं ते तिला मिळत असे. या गोष्टीचा अनिशाने कधी गैरफायदा घेतला नव्हता. पण अनिशा खूप स्वतंत्र विचारांची होती. अनिशाने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिला मनासारखा उत्तम जॉबसुद्धा मिळाला. आता तिच्या आईला वेध लागले होते ते तिच्या लग्नाचे. आईला माहिती होतं की अनिशा घाईने लग्न करणार नाही. पण ‘बोलून घेऊ’ असा विचार करून एके दिवशी आईने हे अनिशाशी बोलायचा निर्णय घेतला.

‘‘अनिशा, मस्त मूड दिसतो आहे आज? काही विशेष?’’ अनिशाची आई बोलली.

‘‘नाही गं आई. जॉबमध्ये मजा येतेय, सो खुश आहे. मनासारखं काम करता येत आहे. उगाच कोणाची लुडबुड नसते. मला अशाच ठिकाणी काम करायचं होतं.’’

‘‘व्वा! जॉब आवडला आहे हे छान. बरं सांग, लग्नाबद्दल काय मतं आहेत तुझं? बरेच दिवस बोलायचं होतं, पण राहूनच जात होतं. आज निवांत दिसलीस म्हणून म्हटलं बोलून घेऊ.’’ अनिशाची आई बोलली आणि तिचं बोलण ऐकून अनिशाने कपाळावर हात मारून घेतला.

‘‘लग्न? हा एकच विषय असतो का गं आई. माझ्या कामाबद्दल बोल, ऑफिसबद्दल बोल, मित्र मैत्रिणींबद्दल बोल. पण ते नाही तर सारखं लग्न हाच विषय तुझ्या डोक्यात. तुला माहिती आहे लग्न हा माझ्यासाठी महत्वाचा विषय नाहीए.

म्हणजे आत्ता तरी नाही. सो मी आता जाते आणि मी बोलत नाही तोपर्यंत हा विषय प्लीज नको गं.’’

अनिशा इतकं बोलली आणि तिथून निघून गेली. तिच्या आईनेसुद्धा तो विषय तिथेच बंद केला आणि कामाला लागली.

पाहता पाहता दिवस पुढे सरत होते. अनिशाने ताकीद दिल्यामुळे आईने परत लग्नाचा विषय काढला नाही आणि अनिशा तिच्या रुटीनमध्ये बिझी झाली.

अनिशाला कामावर जॉईन होऊन एक वर्ष झालं. अनिशा छान मूडमध्ये होती. अनिशाने नवीन कपडे घातले आणि ती ऑफिसला पोहोचली. ऑफिसमध्ये शिरल्या शिरल्या तिला नील दिसला. त्याच्या हातात भला मोठा पुष्पगुच्छ होता. अनिशाला पाहून त्याने तो पुष्पगुच्छ तिला दिला. अनिशा खूप खुश झाली.

‘‘काँग्रॅट्स अनिशा…आज तुला इथे जॉईन होऊन एक वर्ष झालं बघ बरोबर.’’

‘‘तुझ्या लक्षात आहे नील. थँक्यू सो मच. खरं तर मी पूर्णपणे विसरले होते. सकाळी कॅलेंडर पाहिलं तेव्हा आठवलं.’’

‘‘मी कसा विसरेन अनिशा. एक वर्षापूर्वी मी तुला पाहिलं आणि त्या दिवसापासून तुझ्या आकंठ प्रेमात बुडालो आहे.’’ नील पुटपुटला. पण हे त्याला मोठयाने बोलायची हिंमत नव्हतीच. तो काय बोलतो आहे हे अनिशाला ऐकू आले नाही म्हणून तिने त्याला प्रश्न केला.

‘‘नील, आत्ता काही बोललास?’’

‘‘नाही गं. मी काही नाही बोललो. सो तू सांग, आज पार्टी देणार आहेस की नाही?’’

‘‘पार्टी कसली रे…’’

‘‘काय अनिशा. इथे एक वर्ष झालं अन् त्याचं सेलिब्रेशन तो बनता है ना…’’ नील बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून अनिशाच्या चेहऱ्यावर छान हसू आले.

‘‘आधी काम करू, मग संध्याकाळी जाऊ कुठेतरी. आणि हो, मी इतकीही कंजूस नाही…पार्टी देईन… फक्त तुला, कारण तू माझी बेस्टी आहेस…आणि तसंही, इतर कोणाच्या लक्षात आहे असं मला वाटत नाही, सो त्यांना पार्टी द्यायचा प्रश्नसुद्धा नाही.’’

अनिशाचं बोलणं ऐकून नील खुश झाला. त्याने खिशात हात घातला. तो जरा अस्वस्थ झाला. मग मात्र त्याने खिशातून हात बाहेर काढला. अनिशा ते पाहत होती. नील अस्वस्थ का आहे हे विचारणार होती, पण तितक्यात नील बोलायला लागला.

‘‘चला आता कामाला लागू नाहीतर काम झालं नाही तर जास्त वेळ थांबून काम पूर्ण करावं लागेल.’’

अनिशा फक्त हसली आणि तिला जाणवलं की नील तिच्यापासून काहीतरी लपवतो आहे. अनिशाला नीलशी बोलायचं होतं, पण तिच्या डोळयासमोर काम येत होतं… म्हणून ती काम करायला तिच्या डेस्कवर गेली. अनिशा तिथून गेली आणि नीलने पुन्हा खिशात हात घातला आणि स्वत:शीच हसून बोलला.

‘‘साहेब करा थोडी हिंमत आणि बोला जे वाटतंय ते. आता फार उशीर करून चालणार नाही.’’

मग मात्र नीलसुद्धा त्याच्या डेस्कवर जाऊन काम करायला लागला.

होता होता दुपार झाली. लंच ब्रेक झाला. नील पुन्हा अनिशाच्या डेस्कजवळ आला. मग दोघांनी कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण केलं. जेवतानासुद्धा नील सारखा खिशात हात घालून काहीतरी चाचपडत होता. पण काही बोलत मात्र नव्हता. दोघांचं जेवण आवरलं आणि दोघे पुन्हा आपल्या कामाला लागले. अनिशाला जाणवत होतं की नीलला तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण तो ते बोलणं टाळत होता. संध्याकाळ झाली. ऑफिसमधले सगळे काम आवरून बाहेर पडत होते. अनिशानेसुद्धा तिचं काम आवरलं आणि बॅग भरली. ती नीलच्या येण्याची वाट पाहायला लागली. पण नील काही आला नाही. मग शेवटी तिच उठली आणि नीलच्या डेस्कपाशी गेली. नीलचं काम आवरलं होतं, पण तो डोळे मिटून काहीतरी विचार करत होता. त्याला उठवणं खरं तर अनिशाच्या जीवावर आले होते, पण तिने शेवटी नीलला हाक मारलीच.

‘‘नील, झोपलास का काय? आणि आवर की. जायचं आहे ना आपल्याला?’’

नील ने काही प्रतिसाद दिला नाही. मग मात्र अनिशा अस्वस्थ झाली. तिने नीलला हलवलं आणि परत बोलली.

‘‘नील…चल की…’’

मग मात्र नील भानावर आला.

‘‘ओह सॉरी…मी काहीतरी विचार करत होतो आणि तंद्री लागली. तू कधी आलीस? मला नाही कळलं खरंच.’’

‘‘आत्ताच आले रे. मी सकाळपासून पाहतेय, इतका का अस्वस्थ आहेस?’’

‘‘काही नाही. नको जायला आज तुझ्या पार्टीला. नंतर कधीतरी जाऊ अनिशा.’’

‘‘काय झालं आहे नील? सकाळी तूच तर म्हणलास पार्टी हवीये आणि आता तूच म्हणतो आहेस, आत्ता पार्टी नको. आपण इथून बाहेर पडू. मग एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि बोलू. आणि तू अस्वस्थ वाटतो आहेस आज. सारखा खिशात हात घालतोस, पण काहीतरी पुटपुटतो आहेस. मला त्याबद्दल बोलायचं आहे. नेहमी माझ्याबरोबर असतोस, माझी इतकी काळजी घेतोस. आता आज माय टर्न… बघू, काय त्रास देतंय माझ्या मित्राला.’’ अनिशा हसली आणि तिने नीलचा हात धरून त्याला उठवलं. मग मात्र दोघे ऑफिसमध्ये थांबले नाहीत. ते एका छान रेस्टॉरंटमध्ये गेले आणि अनिशाने खायची ऑर्डर दिली, मग ती बोलायला लागली.

‘‘आता बोल. काय होतंय तुला आज? आपण एक वर्ष सोबत आहोत. नेहमीच सोबत असतो. तुला काही झालं की तू आधी मला सांगतोस, पण आज मात्र असा का वागतो आहेस मला कळत नाहीए.’’

‘‘सोड गं अनिशा. मला माहिती आहे. तुझं उत्तर नाहीच असणारे. मग कशाला ना उगाच. तुला त्रास, मला त्रास. आणि आज सारखं वाटतं…बोलावं पण मग असा विचार येतो, जाउदे…उगाच गैरसमज नको.’’

‘‘तू काय बोलतो आहेस नील? थोडं स्पष्ट बोलशील का?’’

‘‘काय बोलू स्पष्ट?’’

‘‘जे तुझ्या मनात आहे ते.’’

‘‘मी बोलेन, पण अजिबात वाईट प्रतिक्रिया द्यायची नाही बघ.’’

‘‘नाही रे…तू सांग तर खरं…’’

नीलने खिशात हात घालून एक डबी काढली आणि त्यातून एक अंगठी  काढली. अनिशाने ते पाहिलं आणि ती खुश झाली.

‘‘ओह माय नील. तुला कोणीतरी आवडते आणि ही अंगठी तिच्यासाठी? कधी करणारेस प्रपोज? ओह…मला आत्ता कळलं, तू अस्वस्थ का आहेस. तुला भीती वाटते आहे का? घाबरू नकोस. मी आहे. घे बोलावून इथे…’’ अनिशा उत्साहाने बोलली.

‘‘अनिशा…तुला काहीच समजत नाही की तू न समजल्याचं नाटक करतेस गं? मला तू आवडतेस. तू आणि फक्त तू…तुला तर काही कळतंच नाही ना आणि आता कळलं आहे तर तू नाही म्हणणार. मला माहिती आहे. मी तुला चांगलं ओळखतो. तुला आत्ता लग्न नकोय. तुझी तिच बडबड…नको होतं मला हे सगळं, पण आज माझा भावनांवर कंट्रोल राहिला नाही गं.’’ नील उदास होऊन बोलला, ‘‘तुला कधीच माझं प्रेम कळलं नाही ना? मला तर वाटलं होतं, तुला कधीतरी कळेल आणि तू आपणहून विचारशील. पण जाऊ दे. मी जातो आता. तू खा एकटी.’’ नील उदास होऊन बोलला. अनिशासुद्धा ओशाळली. तिच्यासमोर तिचं प्रेम तिची वाट पाहत होतं, पण ती सतत स्वत:मध्येच मग्न असायची. तिला तिची चूक कळली.

‘‘थांब नील. मला नव्हतं कळलं हे प्रेम आहे आणि सगळं स्वत:च ठरवणार तर मला सांगितलंस कशाला? तू आधी विचारू शकला असतास. पण कधी विचारलं मला? आपण जनरल बोलयचो लग्नाबद्दल, पण तुझं प्रेम आहे हे कधी बोललास? आज तू सांगितलं, पण स्वत:च निर्णय देऊन मोकळासुद्धा झालास. मी लग्नाचा विचार कधी सिरिअसली केलाच नव्हता. तू माझा खूप छान मित्र आहेस.’’

‘‘हो ना. तू भारी. जगावेगळी. तुला प्रेम कळत नाही…कशाला बोलतो आहे तु?याशी?’’ नील उखडून बोलला.

‘‘शट अप नील… मा?याकडे बघ…’’ तिने डावा हात पुढे केला.

‘‘आता काय?’’

‘‘अंगठी घाल… मला कळलं नव्हतं. पण आत्ता मी विचार केला. तुला माझ्यापेक्षा अजून चांगली कोणी मिळणार नाहीए. आय वरी फॉर यु नील…’’

अनिशा स्वत:शीच हसली आणि तिचं बोलणं ऐकून नील खूप खुश झाला. त्याने अनिशाच्या बोटात अंगठी घातली आणि तिचा हात हातात घट्ट दाबून ठेवला. मग तो मनसोक्त हसत बोलला, ‘‘माझिया प्रियाला प्रीत कळली…’’ मग दोघे आपल्या प्रेमाच्या जगतात हरखून गेले.

सायोनारा

कथा * शकुंतला सिन्हा

देवेंद्र ऊर्फ देवचं पोस्टिंग त्यावेळी झारखंड राज्यातल्या जमशेदपूरच्या टाटा स्टील इंडस्ट्रीजमध्ये होतं. तो इंजिनीयर होता. मुळचा पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातला, पण त्याच्या वडिलांचा जमशेदपूरला बिझनेस होता. जमशेदपूरला टाटा नगरी म्हणतात. तिथल्या बिष्ठुपुर भागातच त्यांचं कापड दुकान होतं.

देवचं शिक्षण तिथंच झालेले. इंजिनीयरिंग रांचीतून केलं. कॅम्पस इंटरव्हयूमध्ये लगेच नोकरीही मिळाली. तीही टाटा स्टीलमध्येच. इतर दोन तीन ऑफर्स होत्या त्याला, पण इथल्या रेखीव वसाहती, दलमा टेकडी, स्वर्णरेखा नदी अन् ज्युबिली पार्कचंही आकर्षण होतंच. शिवाय आईवडिलही होतेच.

खरकाई नदीच्या पलीकडे आदित्यपुरला त्याच्या वडिलांची मोठी हवेली होती. पण कंपनीनं त्याला इथंच ऑफिसर्स फ्लॅट्समध्ये एक छानसा फ्लॅट दिला होता. त्याला शिफ्ट ड्यूटी असायची. बऱ्याचदा रात्रपाळी करावी लागे. त्यामुळे त्यानं इथंच राहणं पसंद केलं होतं. त्यामुळे त्याचे आईवडिलही हवेलीचा काही भाग भाड्यानं देऊन इथंच त्याच्या फ्लॅटवर राहायला आले होते.

याच दरम्यान टाटा स्टीलच्या आधुनिकीकरणाचा प्रोजेक्ट आला. जपानच्या निप्पोन स्टीलच्या तांत्रिक सहयोगानं टाटा कंपनी आपल्या फोल्ड रोलिंग मिल आणि कंटिन्यूअस कास्टिंग शॉपच्या निर्मितीत गुंतली होती. देव सुरूवातीपासूनच या प्रोजेक्टमध्ये होता. जपानहून निप्पोन कंपनीनं काही टेक्निकल एक्सपर्र्ट्सही टाटा नगरीला पाठवले होते. ही मंडळी टाटा स्टीलच्या वर्कर्स आणि इंजिनीयर्सना टे्निंग देण्यासाठी आलेली होती. त्याच्यासोबत काही दुभाषीही होते. जे जपानीचं इंग्रजीत भाषांतर करून इथल्या लोकांना समजावून सांगत होते. त्या टीममध्येच अंजूही होती. जपानी व इंग्रजीवर तिचं प्रभुत्व होतं. वीस वर्षांची सुंदर तरुणी, मुख्य म्हणजे तिचे फीचर्स जपानी वाटत नव्हते. जवळजवळ सहा महिने हे सर्व तिथे राहिले. या दरम्यान अंजू व देवची चांगली ओळख झाली होती. देव तिला भारतीय पदार्थ खाऊ घालायचा. कधीतरी तीही त्याला जपानी पदार्थ करून खाऊ घालायची. इथलं काम संपवून ती सहा महिन्यांनी जपानला निघून गेली.

तिला निरोप द्यायला देव कोलकत्त्याच्या विमानतळावरही गेला होता. त्यानं तिला एक संगमरवरी ताजमहाल अन् बौद्धगयेतील बुद्ध मंदिराचा फोटो भेट म्हणून दिला. ही भेट बघून अंजूला खूप आनंद झाला. निरोप घेताना शेकहॅण्ड करत देवने म्हटलं ‘‘बाय…बाय…’’

अंजूनं हसून म्हटलं, ‘‘सायोनारा…’’ अन् ती एअरपोर्टच्या दरवाजातून आत गेली.

काही दिवसांनी नवीन काहीतरी शिकण्यासाठी टाटा स्टीलनं आपली एक टीम जपानला पाठवली. तिथल्या ओसाका फ्लॅटमध्येच हे टे्निंग होतं. या टीममध्ये देवचा समावेश होता. योगायोगाने इथंही दुभाषी म्हणून अंजूच आलेली होती. अवचित भेटल्यामुळे दोघांनाही आनंद झाला. एरवी टे्रनिंग खूपच टफ होतं. पण वीक एंडला दोघं भेटायची. एकत्र कॉफी घ्यायची.

बघता बघता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता टे्निंग संपायला थोडेच दिवस उरले होते. देवनं म्हटलं, ‘‘जवळपास बघण्यासारखं काही असेल तर दाखव ना?’’

‘‘हो, इथून हिरोशिमा जवळच आहे. बुलेट टे्ननं दोन तासातच पोहोचता येईल.’’

‘‘मला जायचंय तिथं. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं तिथंच अणुबॉम्ब टाकला होता ना?’’

‘‘होय, सहा ऑगस्ट १९४५ त्या अभद्र दिवशीच ती घटना घडली. कोणताही जपानी, जपानीच काय पण सारं जग ती घटना विसरणार नाही. माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, सुमारे ऐंशी हजार लोक एका क्षणात मृत्यूमुखी पडले होते अन् पुढल्या चारच महिन्यात ही संख्या एक कोटी एकोणपन्नास लाख एवढी झाली होती.’’

‘‘खरोखरंच फार दुर्देवी घटना होती ती. जगात पुन्हा कुठेच असं काही घडता कामा नये.’’

‘‘परवाच सहा ऑगस्ट आहे. मीही चलते तुझ्यासोबत. जपानी लोक या दिवशी शांतता स्थापित व्हावी म्हणून तिथं प्रार्थना करतात,’’ अंजूनं म्हटलं.

दोन दिवसांनी दोघंही हिरोशिमाला गेली. तिथं दोन दिवस थांबली. तिथल्या पीसपार्कमध्ये प्रार्थना केली. मग दोघंही हॉटेलात गेली. लंचमध्ये अंजूनं स्वत:साठी लेडीज ड्रिंक शोंचू ऑर्डर केलं. तिने देवला विचारलं, ‘‘तू काय घेणार?’’

‘‘आज मीदेखील शोंचू टेस्ट करून बघतो. दोघंही सोफ्यावर बसून जेवत होती. एकमेकांच्या खूपच जवळ आली होती.. अंजूनं त्याला किस केलं अन् म्हणाली, ‘‘एशिते इमासू.’’

देवला काहीच कळलं नाही. तेव्हा तिनं सांगितलं याचा अर्थ ‘‘आय लव्ह यू.’’

त्यानंतर दोघंही जणू या जगात नव्हतीच. त्यांच्यामधलं द्वैत कधी संपलं ते दोघांनाही समजलं नाही.

तिच्यापासून दूर होताना देव म्हणाला, ‘‘अंजू, तू मला जे सुख दिलंस…खरं तर मीच तुला प्रपोज करणार होतो.’’

‘‘मग आता कर ना? खरं तर मी लाजायला हवं, तर तूच लाजतो आहेस…’’

‘‘ही घे अंगठी,’’ आपल्या बोटातली अंगठी काढत देवनं म्हटलं, ‘‘सध्या यावरच भागवूयात.’’

‘‘नको, नको,’’ त्याला अडवत अंजू म्हणाली, ‘‘तू प्रपोज केलंस, मी होकार दिला…मला अंगठी नकोय…ती तुझ्या बोटातच राहू दे.’’

‘‘ठीक आहे. टे्निंग संपताच भारतात परत गेलो की आईबाबांना सगळं सांगतो. मग तूच तिथं ये. आपलं लग्न भारतीय पद्धतीनंच होईल,’’ देवनं म्हटलं.

‘‘मी त्या दिवसाची आतुरतेनं वाट बघते,’’ अंजू म्हणाली.

टे्निंग संपवून देव भारतात परत आला. इकडे त्याच्या गैरहजेरीत त्याच्या आईबाबांनी त्याचं लग्न ठरवून ठेवलं होतं. देव त्या मुलीला ओळखत होता. तिचे वडिल व देवचे वडिल पक्के मित्र होते. दोन्ही कुटुंबांचा खूप घरोबा होता. मुलीचं नाव अजिंदर होतं. ती पंजाबी होती. तिच्या वडिलांना धंद्यात खूपच नुकसान झाल्यामुळे त्यांनी आत्महत्त्या केली होती. ते कुटुंब त्या दु:खात अन् धक्क्यात असतानाच देवच्या आईबाबांनी अजिंदरच्या आईला सांगितलं होतं की अजिंदरला आम्ही सून करून घेऊ.

देवला जेव्हा अजिंदरशी लग्न ठरवल्याचं कळंलं तेव्हा त्यानं या गोष्टीला नकार दिला. ‘‘आई, माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी अजिंदरसोबत लग्न करू शकत नाही.’’ त्यानं सांगितलं.

‘‘पण तिच्यात वाईट काय आहे? अन् तू कोणती मुलगी पसंत केली आहेस?’’ बाबांनी विचारलं.

‘‘ती जपानी मुलगी अंजू…आपल्याकडे आली होती. आठवतंय का?’’

‘‘देव, त्या परदेशी पोरीशी तू लग्न करणार? आम्हाला हे अजिबात मान्य नाही. आपल्या देशात मुलींचा दुष्काळ पडलाय का? आम्ही अजिंदरच्या आई व आजीला वचन दिलंय.’’ बाबा भडकून म्हणाले.

‘‘बाबा, मी ही…’’

‘‘अजिबात काही बोलू नकोस, तुला इथे आईवडिल जिवंत बघायचे असतील तर तुला अजिंदरशी लग्न करावं लागेल.’’ बाबांनी धमकीच दिली.

काही वेळ सगळेच शांत होते. मग बाबा म्हणाले, ‘‘देव, तू जर आमचं ऐकलं नाहीस तर मीही अजिंदरच्या बापाप्रमाणे आत्महत्या करेन. त्या मृत्युसाठी तूच सर्वस्वी जबाबदार असशील.’’

‘‘छे छे, भलतंच काय बोलताय,’’ देवच्या आईनं म्हटलं.

‘‘आता सगळं तुझ्या लाडक्या पोरावर अवलंबून आहे,’’ एवढं बोलून बाबा तिथून निघून गेले.

शेवटी देवला आईबाबांचं ऐकावंच लागलं.

देवनं आपली सगळी परिस्थिती अन् असहायता अंजूला कळवल्यावर ती समजूतदारपणे म्हणाली की त्यानं अजिंदरशीच लग्न करणं योग्य ठरेल.

अंजूनं देवला जरी अगदी सहजपणे मुक्त केलं होतं तरी ती मात्र फारच अडचणीत सापडली होती. देवपासून तिला दिवस गेले होते. अजून एकच महिना झाला होता. पण तिनं देवला हे काहीच कळवलं नाही. त्याला कशाला उगीच काळजी अन् अपराधबोध.

पुढच्याच महिन्यात देवचं लग्न होतं. त्यानं अंजूला लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं. तिनंही येते म्हणून कळवलं.

अगदी मोकळ्या मनानं अंजू देवच्या लग्नात सहभागी झाली. पण तिला वरचेवर उलट्या होत होत्या. ‘‘तुला बरं नाहीए का?’’ देवनं विचारलं.

‘‘बरी आहे मी…पण विमान प्रवासाचा थोडा त्रास अन् लग्नाचं हे जड जेवण यामुळे मला बरं वाटत नाहीए.’’

लग्नानंतर तिनं देवला म्हटलं की तिला बोधगयेला जायचंय.

देव म्हणाला, ‘‘मी व अजिंदरही येतो,’’ त्यानं गाडी बुक केली व तिघंही एकत्रच बोधगयेला गेले. अंजूनं आधीच गोळ्या वगैरे घेतल्यामुळे तिला प्रवासाचा त्रास झाला नाही. रात्री तिघंही एकाच रूममध्ये राहिले. कारण अजिंदरचाच आग्रह होता, ‘‘पुन्हा केव्हा अशी संधी मिळणार. आज एकत्र राहू व पोटभर गप्पा मारू.’’

गयेतून अंजू जपानला गेली. देव व अजिंदरनं तिला विमानतळावर सोडलं. निरोप घेताना दोघांनी तिला बाय केलं. तिनंही हसून ‘सायोनारा’ म्हटलं संपर्कात राहा, असंही सांगितलं.

लग्नानंतर दहा महिन्यातच अजिंदरला मुलगा झाला. त्याच्या दोन महिने आधी अंजूला मुलगी झाली होती. तिचा चेहरा अगदी देवसारखा होता. इकडे देवचा मुलगाही हुबेहुब देवसारखाच होता. त्यानं अंजूला आपल्याला मुलगा झाल्याचं कळवलं होतं, पण अंजूनं मात्र त्याला मुलीबद्दल काहीच कळवलं नव्हतं. अजिंदर, अंजू व देवचा इंटरनेटवर संपर्क होता. ती त्याच्या मुलाला गिफ्ट पाठवायची. लग्नाच्या वाढदिवसालाही भेटवस्तू द्यायची.

देव तिला म्हणायचा, ‘‘तू लग्न कर…मला तुला काही भेटवस्तू द्यायला निमित्त हवं ना?’’

ती उत्तर टाळायची. एकदा म्हणाली, ‘‘मी माझ्या आजीकडेच वाढले कारण आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. मला लग्न करण्याची इच्छा नाहीए. पण मी एक मुलगी दत्तक घेतली आहे. एकल पालक म्हणून तिला वाढवते आहे.’’

देवनं मग फार काही विचारलं नाही. फक्त विचारलं, ‘‘मुलीचं नाव काय आहे?’’

‘‘तिचं नाव किको आहे. किकोचा अर्थ ‘आशा’ असा आहे. तिच माझ्या आयुष्याची एकमेव आशा आहे.’’

‘‘तिचे फोटो पाठव ना?’’ अजिंदरनं म्हटलं.

‘‘पाठवेन…’’ अंजू म्हणाली.

काळ पुढे पुढे जात होता. देवचा मुलगा व अंजूची मुलगी एव्हाना सात वर्षांची झाली होती. एक दिवस अंजूचा ई मेल आला. निप्पोन कंपनी एक इंजिनियर व टेकनियन्सची टीम टाटाला पाठवते आहे. त्यांच्याबरोबर इंटरप्रिटर म्हणून अंजली येते आहे.

ठरल्याप्रमाणेच अंजू आली. शिवमसाठी खूप गिफ्ट आणल्या होत्या.

‘‘किकोला का नाही आणलंस?’’

‘‘एक तर तिला व्हिसा मिळाला नाही. शिवाय शाळा बुडाली असती. माझ्या एका मैत्रीणीजवळ सोपवून आले आहे. तिची मुलगी किकोची खास मैत्रीण आहे,’’ अंजूनं म्हटलं.

अंजूच्या टीमचं काम दोन अडीच आठवड्यात आटोपलं. ती परत जाणार होती. त्याच्या आदल्या दिवशी देवकडे डिनरला आली. तिघांनी खूप गप्पा मारल्या. हसत खेळत जेवण झालं.

दुसऱ्यादिवशी अंजू टे्ननं कोलकत्त्याला जाणार होती. रेल्वेस्टेशनवर अजिंदर व देव तिला सोडायला गेली.

टे्रन सुटता सुटता अंजूनं आपल्या बॅगेतून एक मोठासा बॉक्स काढून अजिंदरला दिला.

‘‘हे काय? सध्या तर गिफ्ट घेण्यासारखा काहीच प्रसंग नाहीए?’’ तिनं म्हटलं.

‘‘घरी जाऊन बघ.’’ अंजू म्हणाली. टे्रन सुरू झाली. हात हलवून अंजूनं म्हटलं, ‘‘सायोनारा…’’

घरी जाऊन बॉक्स उघडला तेव्हा कीकोचा एक सुंदर मोठा फोटो फ्रेम केलेला मिळाला. त्या खाली लिहिलं होतं, ‘हिरोशिमाचा एक अंश.’

चकित होऊन दोघंही बघत होती. शिवम अन किको जुळी भावंडं दिसत होती. फक्त किकोचा रंग जपानी गोरा होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें