पती-पत्नी संबंध : आपण नाही तर काही नाही

* प्रतिनिधी

‘माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम आहे, तुझ्या नकाराने वास्तव बदलणार नाही…’ नवरा-बायकोचं नातं असं काहीसं असेल तरच नातं दीर्घकाळ आनंदी राहू शकतं. पती-पत्नीमध्ये वाद झाला तरी प्रेम आणि अवलंबित्व कमी होत नाही. ‘तू माझ्यासाठी काय केलंस?’ किंवा ‘माझ्याशी असं का केलंस?’ असं म्हणत पती-पत्नीचं प्रेम कमी होत नाही.

खेदाची बाब आहे की, पती-पत्नीमध्ये तर्क आणि शिक्षणाचा सिमेंट पूल बांधूनही त्या पुलांना जाड खड्डे पाडून त्यात अडकून पडणाऱ्या घटकांची कमी नाही. पती-पत्नी एकमेकांचे प्रेम नाकारतात आणि ते शून्य करतात. महिलांच्या संरक्षणाच्या आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली बनवले जाणारे कायदे आणि याआधी केलेल्या कायद्यांची वाढती व्याप्ती यामुळे पती-पत्नीमधील संभाव्य गहिरे प्रेमाचे सिमेंट वाळून जात आहे.

आजच्या युगात कोणताही मुलगा मुलीवर जबरदस्ती करत नाही किंवा बंदुकीच्या दोरीच्या जोरावर मुलगी मुलाच्या गळ्यात बांधली जात नाही. प्रत्येक विवाह हा आनंदाचा गठ्ठा असतो ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब गुंतलेले असते. साधनेच्या पलीकडे खर्च केला जातो आणि वधू-वरांना त्यांच्यातील बंध नेहमीच ताजेतवाने पाहण्यासाठी किती लोक उत्सुक असतात याची जाणीव करून दिली जाते.

नवरा-बायकोचं नातं खरं तर असं काहीसं असतं

‘आमची शैली अशी आहे की जेव्हा आपण बोलतो तेव्हा पावसासारखा पाऊस पडतो आणि जेव्हा आपण गप्प राहतो तेव्हा शांततेची आस लागते…’ पण कायदा त्या पावसाचे वादळात रूपांतर करून मौनाला जन्मठेपेची शिक्षा देत आहे. खेदाची बाब आहे की, ज्या कायद्याने नाती मजबूत करणे, वाद मिटवणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, सीमारेषा आखायच्या होत्या, तोच कायदा आता वेगळे राहायला शिकवत आहे.

‘तुम्हाला कायम कुणासोबत राहायचे असेल तर त्याच्यापासून काही काळ दूर राहा’ या ऐवजी महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे करून ‘कोणाचे तरी कायमचे राहणे, त्याच्यापासून कायमचे दूर राहणे का आवश्यक आहे’ असे केले आहे. अडचण अशी आहे की देशाच्या विकासाच्या आणि गोरक्षणाच्या, सीमेचे रक्षण, नोकऱ्यांचे संरक्षण अशा घोषणा देण्यात गुंतलेल्या नेत्यांना कुटुंबाच्या रक्षणाचीही पर्वा नाही आणि पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर दुःखाचे आणि धकाधकीचे जीवन कसे जगतात हे त्यांना कळत नाही. जी अडचण त्यांना पूर्वी असह्य वाटत होती, त्या आगीत ते उडी मारतात ज्यामुळे संपूर्ण आयुष्य राख होते. खेदाची गोष्ट म्हणजे, हा अग्निशामक कायदा नेहमीच पेटवत नाही, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात बोनफायर ठेवण्यात आल्या आहेत.

‘जो माझी झोप (कायदा) हिरावून घेतो, तो आपण शांतपणे कसा करू शकतो?

आता स्वप्नेही गेली, शांतताही गेली

एक जिवंत प्रेत जगण्यासाठी उरले आहे आणि फक्त एकटेपणा आहे …

ते सात दिवस

कथा * रितु वर्मा

मानसीचा आज आपल्या सासरी पहिला दिवस होता. भावजय, नणंद, काकी सर्वजणी मस्करी करून हसत होत्या. अक्षत खोलीत येताच सुधा काकीने तिचा कान ओढत म्हटले, ‘‘अरे लबाडा, थोडेही थांबवत नाही का तुला? आयुष्यभराची सोबत आहे… थोडा धीर धर.’’

मानसीने बघितले की, सर्वजण थट्टा-मस्करी करत होते. मात्र अक्षतची आई म्हणजे मानसीची सासू माधुरीच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती.

मानसी आणि अक्षतचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. कुंदन हार आणि मोत्याच्या रंगाच्या घागरा-चोळीत मानसी अतिशय सुंदर दिसत होती. तर क्रीम रंगाच्या शेरवानीत अक्षतही देखणा दिसत होता.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामी झाले. आता घरात फक्त मानसी, अक्षत, अक्षतची मोठी बहीण निधी आणि अक्षतचे वडील विनोद आणि आई माधुरी होते.

दुसऱ्या दिवशी माधुरीला पाचपरतावनासाठी माहेरी जायचे होते. कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती तेवढयात तिला वाटले की सासूबाईंनाच विचारुया. त्यानंतर हातात साडया घेऊन ती सासूबाईंकडे गेली. ‘‘आई सांगा ना, पिवळया आणि नारंगी रंगापैकी उद्या कोणती साडी नेसू?’’ तिने विचारले.

माधुरी म्हणाल्या, ‘‘बाळा, तुला जी चांगली वाटेल ती नेस, पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल.’’

तितक्यात विनोद रागाने म्हणाले, ‘‘तू तर अडाणीच राहिलीस… डोळयांना खुपणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो, एप्रिल महिन्यात नाही.

माधुरी एकदम गप्प बसल्या. विनोद म्हणाले, ‘‘माधुरी बाळा, तू निधी ताईला विचार.’’

मानसीला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईंशी असे वागणे अजिबात आवडले नाही. सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली की, अक्षतचा स्वभावही त्याच्या वडिलांसारखाच असला तर काय करायचे? शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच.

दुसऱ्या दिवशी मानसी पिवळया रंगाची शिफॉनची साडी नेसून गेली. माधुरी यांनी सकाळी बटाटयाची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता. निधी म्हणाली, ‘‘आई, तू आम्हाला लठ्ठ करणार असे वाटत आहे.’’

अक्षत रागाने म्हणाला, ‘‘आई, किती वेळा सांगितले आहे की, डाएटसाठीचे पदार्थ बनवत जा.’’

विनोद म्हणाले, ‘‘तुझी आई हे सर्व कुठून शिकणार? तिला स्वत:च्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते.’’

तितक्यात मानसी म्हणाली, ‘‘मी तर इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे.’’

मानसीने केलेले कौतुक ऐकून माधुरीचा चेहरा खुलला.

त्यानंतर अक्षत आणि मानसी १५ दिवसांसाठी हनिमूनला गेले. त्यावेळी माधुरीच्या असे लक्षात आले की, अक्षतच्या घरून एकतर त्याचे वडील किंवा बहीणच फोन करतात.

अक्षत आणि मानसी गोव्याहून परत आले तेव्हा निधी ताई तिच्या सासरी निघून गेली होती. मानसीने गोव्याहून आणलेल्या भेटवस्तू सासूबाईंना दाखवल्या. मानसी सासऱ्यांसाठी टी शर्ट आणि सासूबाईंसाठी गॉगल घेऊन आली होती.

माधुरीसाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून विनोद म्हणाले, ‘‘मानसी बाळा, हे काय घेऊन आलीस तू तुझ्या सासूबाईंसाठी? माधुरीने गॉगल कधीच घातलेला नाही. इतकी वर्षे शहरात राहूनही ती थोडीशीही बदललेली नाही. ती काय गॉगल लावणार…?’’

मानसी म्हणाली, ‘‘अहो बाबा, आधी लावला नाही तर बिघडले कुठे? आता लावेल.’’

दुसऱ्या दिवशी विनोद आणि अक्षत कामावर गेले. मानसीकडे अजून ७ दिवसांची सुट्टी शिल्लक होती. ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनाचे लाडू बनवत होत्या. मानसीकडे पाहात त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, ‘‘बाळा, तुला बेसनाचे लाडू आवडतात ना? तेच बनवत आहे.’’

मानसी लाडू खात म्हणाली, ‘‘सासूबाई, खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे.’’

माधुरी निराश होऊन म्हणाली, ‘‘बाळा, गेल्या ३० वर्षांपासून जेवण बनवत आहे. त्यामुळे जेवण चांगलेच बनवता आले पाहिजे ना?’’

मानसी म्हणाली, ‘‘आई, तुम्ही खरंच खूप चांगले जेवण बनवता. सर्वांनाच इतके चांगले जेवण बनवता येत नाही.’’

मानसीच्या लक्षात आले की, तिची सासूबाई घरकामात पारंगत होती, पण ती अजिबातच नीटनेटकी राहायची नाही.

संध्याकाळ होताच माधुरी या विनोद आणि अक्षतसाठी पोहे बनवू लागल्या. तितक्यात मानसी तिकडे आली आणि म्हणाली, ‘‘आई, मी चहा बनवते. तुम्ही जा आणि तयार व्हा.’’

माधुरी म्हणाल्या, ‘‘कशासाठी तयार व्हायचे?’’

मानसीने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली, ‘‘तुम्हाला नीटनेटके पाहून बाबा खुश होतील.’’

विनोद आणि अक्षत घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे घोट घेत अक्षत मानसीला त्याच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागला. विनोद यांनी माधुरीकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि टोमणा मारत म्हणाले, ‘‘माधुरी, मीही तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरे झाले असते…’’

माधुरी डोळयातील अश्रू लपवत स्वयंपाकघरात गेल्या. कपडे बदलताना विचार करू लागल्या की, विनोद यांनी आतापर्यंत कधीच तिला पत्नीचा सन्मान दिला नव्हता. सतत तिला अडाणी म्हणायचे. त्यामुळे आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचाही माधुरी यांना विसर पडला होता.

रात्री मानसीला राहवले नाही, तिने अक्षतला विचारले, ‘‘बाबा सतत आईचा अपमान का करतात?’’

‘‘अगं, बाबा खूप हुशार आहेत आणि आई बावळटासारखी वागते त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात,’’ अक्षतने सांगितले.

नंतर मानसीला मिठीत घेत म्हणाला की, ‘‘प्रत्येक जण माझ्यासारखा नशीबवान नसतो की, त्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर पत्नी मिळेल.

दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी आणि मानसी एकट्या होत्या तेव्हा माधुरी म्हणाली, ‘‘आई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का? तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट का ऐकता?’’

माधुरी म्हणाल्या, ‘‘बाळा, मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही. शिवाय स्वत:च्या पायावर उभी नाही.

मानसी म्हणाली, ‘‘तुम्ही सुंदर दिसता. तुमचा बांधाही कमनीय आहे… फक्त चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवायची गरज आहे.

माधुरी म्हणाल्या, ‘‘उगाच मस्करी करू नकोस. माझी सासू, नणंद, भावजय इतकेच नाही तर माझी मुलेही मला अडाणी समजतात.’’

मानसी म्हणाली, ‘‘आई तुम्हाला असे वाटते, कारण तुम्ही तसा विचार करता… तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसाच दुसरेही करणार.’’

रात्री जेवताना मानसीने विनोद यांना विचारले की, ‘‘बाबा, आपल्या आई खूप छान जेवण करतात. आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर…?’’

विनोद हसत म्हणाले, ‘‘बाळा आजचे जग सादरीकरणाचे आहे… माधुरीसारखे जेवण तर कोणीही बनवू शकते. मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार? तुझी सासूबाई कोणाच्या पुढयात साधे दोन शब्द बोलू शकत नाही… तिने आयुष्यभर काहीच केले नाही, मग आता ५१ वर्षांच्या वयात काय करणार?’’

दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा मानसीने व्यवसायासंदर्भातील सर्व आराखडा तयार केला. तिने ‘माधुरीचे स्वयंपाकघर’ नावाचा एक यूट्यूब चॅनल तयार केला. त्यानंतर म्हणाली, ‘‘आई, तुम्ही जे काही बनवाल त्याचा मी व्हिडीओ तयार करेन. हळूहळू सबस्क्रायबर वाढतील आणि त्यातूनच लोकांना तुमच्या हाताच्या चवीबद्दल समजेल. शिवाय यातूनच तुम्ही तुमचे स्वत:चे उत्पन्न मिळवू शकाल.’’

माधुरी घाबरून म्हणाल्या, ‘‘बाळा, मला हे जमणार नाही.’’

मानसीने खूपच आग्रह केल्यामुळे माधुरी तयार झाल्या, मात्र घाबरून त्यांच्या हातून शेव भाजी करपली. माधुरी म्हणाल्या, ‘‘सांगितले होते ना तुला,  मी बावळट आहे. काहीच करू शकत नाही.’’

मानसी मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. संध्याकाळी म्हणाली, ‘‘आई, सर्वात आधी तुम्ही तयार व्हा. त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा. आपण या नाश्त्यापासूनच सुरुवात करू.’’

मानसीने कसाबसा गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला. मानसीने त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तोच व्हिडीओ आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला. संध्याकाळपर्यंत माधुरीच्या व्हिडीओला २०० व्ह्यूज आणि ३-४ कमेंट मिळाले.

एकाने लिहिले होते, ‘‘बायको असावी तर अशी सुंदर, सुशील आणि पाककलेत निपुण.’’

मानसीने सांगितले, ‘‘बघा आई, कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला.’’

दुसऱ्या दिवशी माधुरी स्वत:च पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या. या नवीन व्हिडीओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता. सून मानसीसोबतचे ते ७ दिवस कधी गेले हेच माधुरीला समजले नाही. त्या ७ दिवसांत माधुरी हसायला आणि स्वत:वर विश्वास ठेवायला शिकल्या.

मानसी कार्यालयात जायची तयारी करत होती. माधुरी तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, ‘‘बाळा, आता त्या चॅनलचे काय होणार?’’

मानसी म्हणाली, ‘‘आई, आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडीओ बनवूया. शिवाय कुणाच्याही मदतीशिवाय स्वत:चा व्हिडीओ कसा बनवायचा, हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेन.’’

मानसीकडून मिळणारे प्रेम आणि सन्मानामुळे माधुरी यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला. सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू लागले. हळूहळू मानसीच्या मदतीने त्या ऑनलाइन ऑर्डर घेऊ लागल्या.

आज माधुरी यांना त्यांचा १० हजारांचा पहिला चेक मिळाला. रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव माधुरी यांना झाली. त्या व्यक्त होऊ लागल्या होत्या. अडाणी, बावळट राहिल्या नव्हत्या. आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून विनोदही आश्चर्यचकित झाले.

अक्षत म्हणाला, ‘‘आई ७ दिवसांत सुनेने तुझा कायापालट करून टाकला.’’

मानसी म्हणाली, ‘‘हुशार त्या आधीपासूनच होत्या फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती.’’

माधुरी मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या होत्या.

प्रतिक्षा फक्त तुझ्या होकाराची

कथा * मिनी सिंह

आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे, हे समजल्यावर दिव्याला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, ‘‘एकदा माझे आयुष्य उद्धवस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा… कृपा करा, जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा,’’ असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली.

पाणावलेल्या डोळयांनी काहीही न बोलता नूतन खोलीबाहेर आल्या.

शेवटी तिच्या या परिस्थितीला नूतनच तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली, याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. दिव्याच्या मनात कुणी दुसरे तर नाही… हेही जाणून घेतले नाही. दिव्याने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की, तिचं अक्षतवर प्रेम आहे… पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.

अक्षत आणि दिव्या एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. अक्षत दिव्यासोबत दिसताच नूतन त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की, बिचारा घाबरून जायचा. दिव्यावर प्रेम आहे, हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो दिव्याचाच विचार करायचा आणि तीही त्याचीच स्वप्नं पाहायची.

‘‘निलेश चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला, याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात?’’

दिव्याचे वडील मनोहर यांनी नूतनला सांगितले. मात्र दिव्या मनापासून लग्नासाठी तयार आहे का? हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.

आईवडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून दिव्याने जड अंत:करणाने लग्नाला होकार दिला. तिला आईवडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवातेवढा हुंडा मिळाला.

‘आमची मुलगी एकुलती एक आहे. आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आता लगेच दिले, तरी काय फरक पडणार?’ असा विचार करून मनोहर आणि नूतन त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे, हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढया मोठया घरात मुलीचे लग्न ठरवून मनोहर यांच्या जीवनाचे सार्थक झाले, असे लोक कौतुकाने म्हणत.

काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून दिव्या सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की, अक्षत एका कोपऱ्यात उभा राहून स्वत:चेच डोळे पुसत होता.

सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूंप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहात होती. तो येताच दिव्याचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वत:ला सावरले, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की, तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल?

क्षणभर दिव्या सुन्न झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले, हे ऐकून दिव्याच्या मनावर मोठा आघात झाला.

जाणूनबुजून तिला असे का फसवण्यात आले? तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला? असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. दिव्याने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली.

सकाळी अंघोळ झाल्यावर ती मोठयांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की, रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला, याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे, हेच तिला सूचत नव्हते, कारण रिसेप्शनवेळी निलेश असा काही वागत होता जसे की, त्यांची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. दिव्याला असे वाटले की, कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल.

पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना, असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल.

एका चांगल्या पतीप्रमाणे निलेश तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू-सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की, तुम्ही दिव्याची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे मनोहर आणि नूतन यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय आहे, हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त दिव्यालाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुढत होती.

सासरी येऊन दिव्याला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसांत एकदाही निलेश दिव्याच्या जवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाचे दोन शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडतेय आणि ती इतकी शांत का आहे, हेच तिला समजत नव्हते. निलेशने विश्वासघात केलाय, हे ती सर्वंना का सांगत नव्हती? पण सांगणार तरी काय आणि कोणाला? असा विचार करून ती गप्प होती.

एकदा झोपेतच दिव्याला असे वाटले की, कुणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित निलेश असेल, असा तिने विचार केला, पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती निलेश नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपडयांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहात होते.

‘‘तू… तुम्ही, इथे माझ्या खोलीत… का… काय करताय इथे बाबा?’’ असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र निलेशच्या वडिलांनी तिला खेचून स्वत:जवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दिव्याला तिच्या डोळयांवर विश्वास बसत नव्हता की, तिचा सासराच तिच्यासोबत…

‘‘मी, मी तुमची सून आहे. मग तुम्ही माझ्यासोबत असे…’’ प्रचंड घाबरलेली दिव्या अडखळत बोलत होती.

‘‘सून…’’ मोठयाने हसत तो म्हणाला, ‘‘तुला माहीत नाही का? माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे.’’

हे ऐकून दिव्याला वाटले की, जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, ‘‘वेडयासारखे काय बोलताय? लाज विकून खाल्लीय का?’’

तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. तो दिव्याच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत दिव्याने दरवाजा उघडला. समोर निलेश आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा.

‘‘खूप झाला हा उंदिर, मांजराचा खेळ… नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसारच घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होतेय ते होऊ दे.’’

सासूच्या तोंडून हे ऐकून दिव्याला काहीच सूचेनासे झाले. चक्कर येऊन इथेच पडायला होईल, असे तिला वाटले. कसेबसे स्वत:ला सावरत ती म्हणाली, ‘‘म्हणजे तुम्हाला माहीत आहे की, तुमचा मुलगा…’’

‘‘हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले, नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती.’’

‘‘पण मीच का… हो गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी… का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला? सांगा, सांगा ना?’’ रागाने दिव्या म्हणाली, ‘‘तुम्हाला काय वाटते, मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे, हे सर्वांना सांगेन.’’

‘‘काय म्हणालीस, सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे… विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की, तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस.’’

दिव्याचे केस ओढत निलेश म्हणाला, ‘‘तुला काय वाटले? तू मला आवडलीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली? जे आम्ही सांगू तेच तुला करावे लागेल, नाहीतर…’’ बोलणे अर्धवटच ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले.

संपूर्ण रात्र दिव्या बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, ‘‘हे बघ सूनबाई, जे घडतेय ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे.’’

हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल दिव्याला तिरस्कार वाटू लागला होता. दिव्याकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नणंदेचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही दिव्याला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते, हे आता तिच्या लक्षात आले होते.

लग्नाला ३ महिने झाले होते. या ३ महिन्यांत असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनांध नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वत:ला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. मनोहर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा दिव्याशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा दिव्यावर खूप जीव आहे, म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाहीत, असे ते दिव्याच्या वडिलांना भासवायचे.

आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे, असे वाटून मनोहर यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव दिव्याला धोक्यात घालायचा नव्हता, म्हणूनच ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली, जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले. ती ओरडत होती, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांची नजर चूकवून दिव्या पळून गेली.

आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून मनोहर आणि नूतन यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेडया मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले, त्यामुळे विश्वासघात तर दिव्याच्या आईवडिलांनी केला आहे.

‘‘हो का, असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही, याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का, याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले, आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालिनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की, मी काय करू शकतो. मोठयात मोठया न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही… तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही,’’ असे सांगताना मनोहर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला.

त्यांचे असे बोलणे ऐकून निलेशच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते, त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली.

‘‘काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही.’’ घाम पुसत निलेशच्या नराधम बापाने सांगितले.

त्यांना वाटू लागले की, हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची अब्रु जाईलच, शिवाय शिक्षा होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या, जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका.

‘पोलीस, कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये’, असा विचार करून मनोहर शांत झाले, मात्र निलेशने लवकरात लवकर दिव्याला घटस्फोट द्यावा, अशी अट त्यांनी घातली.

दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे निलेशने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच दिव्याला घटस्फोट मिळाला.

आता दिव्या स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून रहायची. नीट खात नव्हती. कुणाशी बोलत नव्हती. ‘मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरेवाईट तर करून घेणार नाही ना?’ असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि नूतन यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वत:लाच अपराधी मानत होते. दिव्याने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे, हेच त्यांना समजत नव्हते.

‘‘दिव्या बाळा, बघ कोण आले आहे,’’ तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. ‘‘अक्षत,’’ तिच्या तोंडून शब्द फुटले.

एकेकाळी दिव्या आणि अक्षतचे एकमेकांवर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत, हे मनोहर आणि नूतन यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वत:च दिव्याच्या आयुष्याचा निर्णय घेतला. ‘आता मात्र अक्षतच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता,’ असा विचार करून त्यांनी अक्षतची दिव्याशी भेट घडवून आणली.

थोडासे संकोचत अक्षतने विचारले, ‘‘कशी आहेस दिव्या?’’ तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. ‘‘मला विसरलीस का? अगं, मी अक्षत आहे, अक्षत…

आठवतेय का?’’ तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही दिव्या गप्प होती.

अक्षत हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चूकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे? कँटिनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे…? तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. दिव्या मात्र भकास नजरेने पाहात होती.

तिची अशी अवस्था पाहून अक्षतचे डोळे पाणावले. तो म्हणाला, ‘‘दिव्या तू स्वत:ला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वत:ला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दु:ख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना?’’

‘‘तर मग, मी काय करू? काय करू? मी तेच केले ना, जे माझ्या आईवडिलांनी सांगितले, पण मला काय मिळाले?’’ डोळे पुसत दिव्याने विचारले. तिचे बोलणे ऐकून नूतन हुंदके देत रडू लागल्या.

दिव्याचे हात आपल्या हातात घेऊन अक्षत म्हणाला, ‘‘कधीकधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की, आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वत:चे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की, आपण आपली वाट स्वत: शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे, सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे.

‘‘दिव्या, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे… तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल, याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना? त्यांच्यासाठी, स्वत:साठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल दिव्या…’’

अक्षतच्या बोलण्याचा दिव्यावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, ‘‘आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो. असे का होते अक्षत?’’

‘‘कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ… तुझ्या समोर तुझे सुंदर जग आहे,’’ अक्षतच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की, दिव्या अजूनही मी तेथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे जिथे तू मला एकटयाला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे दिव्या. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळवून टाकेन.

अक्षतच्या छातीवर डोकं ठेवून दिव्या ओक्सबोक्शी रडू लागली, जणू कधीचे साचून राहिलेले दु:ख घळाघळा डोळयांतून ओघळत होते. मनातले दु:ख अश्रूंवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी अक्षतनेही तिला मनसोक्त रडू दिले.

बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि नूतन यांच्या डोळयांतूनही न थांबता अश्रू ओघळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते.

चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची

* कुसुम सावे

‘‘अरे वा आई, कानातले खूपच सुंदर आहेत. कधी घेतलेस? रंजोने आपली आई प्रभाच्या कानातल्या झुमक्यांकडे पाहत विचारले.

‘‘गेल्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा सूनबाई अपर्णाने मला हे झुमके आणि तुझ्या वडिलांना घडयाळ दिले. तिने हे सर्व कधी खरेदी केले ते समजलेच नाही,’’ प्रभाने सांगितले.

डोळे विस्फारत रंजो म्हणाली, ‘‘वहिनीने दिले? अरे वा. त्यानंतर उसासा टाकत म्हणाली, मला तर तिने कधीच असे काही घेऊन दिले नाही. सासू-सासऱ्यांना मस्का मारत आहे. भरपूर मस्का लाव.’’ तिचे लक्ष कानातल्यांकडेच होते. ती म्हणाली, ‘‘कोणी का दिले असेना, पण आई मला तुझे झुमके खूपच आवडले.’’

आवडले असतील तर तुला घेऊन टाक बाळा, त्यात काय मोठे? असे म्हणत प्रभाने लगेचच कानातून झुमके काढून रंजोला दिले. आपण दिलेले झुमके सासूने तिच्या मुलीला देऊन टाकले, हे समजल्यावर अपर्णाला काय वाटेल? याचा विचार प्रभाने एकदाही केला नाही.

प्रभाने झुमके देताच रंजोने लगेचच ते स्वत:च्या कानात घातले. त्यानंतर नाटकी चेहरा करीत म्हणाली, ‘‘तुला मनापासून द्यायचे नसतील तर हे झुमके परत घे आई, नाहीतर मागाहून घरातले, खास करून बाबा म्हणतील की जेव्हा कधी रंजो येते, तेव्हा काही ना काही घेऊन जातेच.’’

‘‘असे काय बोलतेस बाळा, कोण कशाला काय म्हणेल? आणि तुझा या घरावर हक्क नाही का? तुला आवडले असतील तर तूझ्याकडेच ठेव. तू घातलेस किंवा मी घातले, त्यात काय मोठे? माझ्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.’’

‘‘खरंच आई? अरे वा… तू किती चांगली आहेस’’, असे म्हणत रंजोने आईला मिठी मारली. नेहमी ती अशीच वागायची. जे आवडायचे ते स्वत:कडे ठेवायची. ती वस्तू समोरच्यासाठी किती मोलाची आहे, याचा ती साधा विचारही करीत नसे. खूप प्रेमाने आणि पै पै जोडून अपर्णाने आपल्या सासूसाठी ते झुमके विकत घेतले होते. पण, प्रभाने कसलाच विचार न करता ते मुलीला दिले. ती सांगू शकत होती की, हे झुमके तुझ्या वहिनीने खूपच प्रेमाने मला विकत घेऊन दिले आहेत, त्यामुळे मी तुला असेच दुसरे घेऊन देईन. पण, मुलीसमोर सुनेच्या भावनांची कदर प्रभाने कधीच केली नाही.

‘‘आई बघ, मला हे झुमके कसे दिसतात? चांगले दिसतात ना, सांग ना आई?’’ आरशात स्वत:ला न्याहाळत रंजोने विचारले. ‘‘पण आई, माझी एक तक्रार आहे.’’

‘‘आता आणखी कसली तक्रार आहे?’’ प्रभाने विचारले.

‘‘मला नाही, तुझ्या जावयाची तक्रार आहे. तुम्ही ब्रेसलेट देणार, असे सांगितले होते त्यांना, पण अजून घेऊन दिले नाही.’’

‘‘अरे हो, आठवले.’’ प्रभा समजावत म्हणाली, ‘‘बाळा, सध्या पैशांची चणचण आहे. तुला माहीतच आहे की, तुझ्या वडिलांना खूपच कमी पेन्शन मिळते. अपर्णा आणि मानवच्या पगारावरच घरखर्च चालतो.’’

‘‘हे सर्व मला सांगू नकोस आई. तू आणि तुझा जावई मिळून काय ते बघून घ्या. मला मध्ये घेऊ नका,’’ झुमके आपल्या पर्समध्ये टाकत रंजोने सांगितले आणि ती निघून गेली.

‘‘सूनेने दिलेले झुमके तू रंजोला दिलेस?’’ प्रभाच्या कानात झुमके नाहीत, हे पाहून भरतने विचारले. त्यांच्या लक्षात आले होते की, रंजो आली होती आणि तीच झुमके घेऊन गेली.

‘‘हा… हो, तिला आवडले म्हणून देऊन टाकले,’’  काहीसे कचरतच प्रभाने सांगितले आणि ती तेथून जाऊ लागली, कारण तिला माहीत होते की, हे ऐकून भरत गप्प बसणार नाहीत.

‘‘काय म्हणालीस तू, तिला आवडले? आपल्या घरातली अशी कोणती वस्तू आहे, जी तिला आवडत नाही, दे उत्तर? जेव्हा कधी येते तेव्हा काही ना काही घेऊन जातेच. जराही लाज वाटत नाही का तिला? त्या दिवशी आली होती तेव्हा सुनेची पर्स, जी तिला तिच्या मैत्रिणींनी दिली होती ती घेऊन गेली. कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की, ती मनाला वाटेल तशी वागेल,’’ प्रचंड रागावलेले भरत तावातावाने बोलत होते.

आपल्या पतीच्या अशा बोलण्याने नाराज झालेली प्रभा म्हणाली, ‘‘अशी तुमची कोणती संपत्ती घेऊन गेली ती, ज्यामुळे तुम्ही तिला इतके बोलत आहात? फक्त झुमकेच तर घेऊन गेली ना, त्यात काय मोठे? रंजो तुम्हाला पहिल्यापासूनच आवडत नाही.’’

परंतु, आज भरत यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळेच ते संतापत म्हणाले, ‘‘तुझी संपत्ती देऊ नकोस असे तुला कोणी सांगितले आहे का? जे द्यायचे आहे ते सर्व देऊन टाक. पण, कोणीतरी प्रेमाने दिलेली भेटवस्तू अशी दुसऱ्याला देऊन टाकणे योग्य आहे का? जर सूनबाई असे वागली असती तर तुला कसे वाटले असते? किती प्रेमाने तिने तुझ्यासाठी झुमके आणले होते आणि तू ते कुणा दुसऱ्याला देऊन टाकताना क्षणभरही विचार केला नाहीस.’’

‘‘सारखे कुणा दुसऱ्याला, असे का म्हणत आहात? अहो, मुलगी आहे ती आपली आणि मी माझ्या मुलीला एकदा काही दिले म्हणजे कायमचे देऊन टाकले, समजले? मोठे आले सुनेचे चमचे, हूं,’’ तोंड वाकडे करीत प्रभा म्हणाली.

‘‘अगं, तुझी मुलगी तुझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहे, आणखी काही नाही. काय कमी आहे तिला? आपल्या मुलगा, सुनेपेक्षा जास्त कमावतात ते दोघे पतीपत्नी. तरी कधी वाटले तिला की, आपल्या आईवडिलांसाठी किमान २ रुपयांचे काहीतरी घेऊन जाऊया? कधीच नाही. आपले सोडून दे. तिने तिच्या भाचीसाठी आजपर्यंत कधी एखादे खेळणे तरी खरेदी करून आणले आहे का? कधीच नाही. तिला फक्त घेता येते. मला दिसत नाही का? सर्व पाहतोय मी, तू मुलगी, सुनेत किती भेदभाव करतेस ते. सुनेचे प्रेम तुला बेगडी वाटते आणि मुलीचे नाटक म्हणजे प्रेम वाटते. असे डोळे विस्फारून पाहू नकोस माझ्याकडे, समजेलच तुलाही कधीतरी, बघच तू.’’

‘‘खरंच, कसे वडील आहात तुम्ही? मुलीच्या सुखालाही नजर लावता. माहीत नाही रंजोने तुमचे काय बिघडवले आहे, ज्यामुळे ती नेहमीच तुमच्या डोळ्यात खुपते.’’ रडवेल्या स्वरात प्रभा म्हणाली.

‘‘ए… कमी अकलेच्या बाई, रंजो, माझ्या डोळयांना खुपत नाही, उलट काही केल्या सूनबाई अपर्णा तुला आवडत नाही. संपूर्ण दिवस घरात बसून अराम करीत असतेस. ऑर्डर देत राहतेस. तुला कधी असे वाटत नाही की, सुनेला कामात मदत करावी आणि तुझी मुलगी, ती तर येथे आल्यावर हातपाय हलवायचेही विसरून जाते. सर्व काही करते अपर्णा या घरासाठी. बाहेर जाऊन कमावते आणि घरही चांगल्या पद्धतीने सांभाळते. तरीही तुझी तिच्याबद्दल काही ना काही तक्रार असतेच. तू मुलगी, सुनेत इतका भेदभाव का करतेस?’’

‘‘कमावून आणते आणि घर सांभाळते म्हणजे उपकार करीत नाही आपल्यावर. घर तिचे आहे, मग सांभाळणार कोण?’’ नाराजीच्या स्वरात प्रभा म्हणाली.

‘‘अच्छा, म्हणजे घर फक्त तिचे आहे, तुझे नाही? मुलगी कधीही आली की तिच्या पाहुणचारात काही कमी पडू देत नाहीस. पण तुला कधी असे वाटत नाही की, कामावरून थकून आलेल्या सुनेला किमान एक ग्लास पाणी देऊया. फक्त टोमणे मारता येतात तुला. अगं, सूनच नाही, तर तिच्या मैत्रिणीही खटकतात तुला. कधीही आल्या तरी त्यांना काहीतरी वाईट बोलतेसच. तुला असे वाटते की, त्या तुझ्या आणि तुझ्या मुलीविरोधात अपर्णाचे मन कलुषित तर करणार नाहीत ना? म्हणून त्यांना बघून घेत नाहीस, जाऊ दे. मी कोणत्या दगडासमोर डोके फोडत आहे? तुझ्याशी बोलणेही कठीण आहे.’’ असे म्हणत भरत आपले पाय आपटत तेथून निघून गेले.

पण, खरंच तर बोलत होते भरत. या घरासाठी अपर्णा खूप काही करीत होती, तरीही प्रभाची तिच्याविरोधात तक्रार असायची. नातेवाईक असोत किंवा शेजारी, सर्वांना ती हेच सांगायची की, सुनेच्या राज्यात राहायचे म्हणजे तोंड बंद करूनच जगावे लागणार, नाहीतर मुलगा, सून आम्हाला कधी वृद्धाश्रमात पाठवतील, हे समजणार नाही. जमाना बदलला आहे. आता सुनेला नाही तर सासूला घाबरून राहावे लागते. प्रभाचे हे बोलणे ऐकून अपर्णा मान खाली घालत असे, पण कधीच उलटून बोलत नसे. मात्र तिच्या डोळयातून वाहणारे अश्रू तिच्या मनाला होणाऱ्या वेदनांचे साक्षीदार असत.

अपर्णाने या घरात पाऊल टाकताच प्रभाला स्वत:ची आई मानले होते. प्रभा मात्र अजूनही तिला दुसऱ्याच्या घरची मुलगी, असेच समजत असे. अपर्णाने प्रभासाठी काहीही केले तरी प्रभाला ते नाटकी वाटायचे आणि ‘‘आई, तुझी तब्येत तर बरी आहे ना?’’ असे रंजोने एकदा जरी विचारले तरी प्रभाचा आंनद गगनात मावेनासा व्हायचा.

त्या दिवशी अपर्णा केवळ एवढेच म्हणाली होती की, ‘‘आई जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. शिवाय डॉक्टरांनीही तुम्हाला चहा पिऊ नका असे सांगितले आहे. हॉरलेक्स घेऊन आले आहे मी, तुम्ही दुधासोबत हे प्या, असे म्हणत तिने प्रभासमोर ग्लास ठेवले. प्रभाने तिचा हात झटकत ते तिच्या हातातून काढून घेतले व टेबलावर आपटत म्हणाली, ‘‘तू मला डॉक्टरांच्या नावाने सल्ले देऊ नकोस. जे मागितले आहे तेच दे. नंतर पुटपुटत म्हणाली, ‘मोठी आली मला शिकविणारी, चांगले बनण्याचे नाटक हिच्याकडून शिका.’ अपर्णाची प्रत्येक गोष्ट तिला बेगडी आणि नाटकी वाटत असे.

मानव ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता. अपर्णाही आपल्या चुलत भावाच्या लग्नाला गेली होती. पण मनातल्या मनात तिला अशी भीती वाटत होती की, सासू तसेच सासऱ्यांना एकटे सोडून आली आहे, त्यांची तब्येत तर बिघडणार नाही ना? हाच विचार करून तिने लग्नाला येण्यापूर्वीच रंजोला दोघांकडे लक्ष ठेवण्यास व दिवसातून कमीत कमी एकदा येऊन त्यांना बघून जा, असे सांगितले होते. हे ऐकून रंजो रागावत म्हणाली होती की, ‘‘वहिनी, तू सांगितले नसतेस तरी मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली असती. तुला काय वाटते, तू एकटीच आहेस का त्यांची काळजी घेणारी? अगं, मुलगी आहे मी त्यांची, सून नाही, समजले का?’’ रंजोच्या अशा बोलण्यामुळे अपर्णा खूपच दुखावली होती, तरीही गप्प बसली. मात्र, अपर्णा गेल्यानंतर रंजो एकदाही माहेरी आली नाही, कारण आल्यावर तिला काम करावे लागले असते. कधीकधी फोन करून विचारपूस करायची आणि सोबतच वेळ नसल्यामुळे भेटायला येऊ शकत नाही, पण वेळ मिळताच नक्की येईन, असे खोटेच सांगायची. प्रभा विचार करायची, आपल्या मुलीकडे खरंच वेळ नसेल नाहीतर भेटायला नक्की आली असती.

एका रात्री अचानक भरत यांची तब्येत खूपच बिघडली. प्रभा इतकी घाबरली की, काय करावे तिला काहीच सूचत नव्हते. तिने मानवला फोन लावला, पण त्याचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यानंतर तिने मुलगी रंजोला फोन लावला. बेल वाजत होती, पण कोणी फोन उचलत नव्हते. जावयालाही फोन लावला, पण त्यानेही उचलला नाही. प्रभाने रंजो व तिच्या नवऱ्याला अनेकदा फोन लावला, पण कुणीही फोन उचलला नाही. ‘कदाचित ते झोपले असतील म्हणून फोनची रिंग त्यांना ऐकू आली नसेल,’ प्रभाला वाटले. अखेर नाईलाजाने तिने अपर्णाला फोन लावला. एवढया रात्री प्रभाचा फोन आलेला पाहून अपर्णा घाबरली.

प्रभा काही बोलण्याआधीच अपर्णाने घाबरत विचारले, ‘‘आई, काय झाले? बाबा ठीक आहेत ना?’’ प्रभाच्या हुंदक्यांचा आवाज येताच ती समजून गेली की, नक्कीच काहीतरी घडले आहे. तिने काळजीने विचारले, ‘‘आई, तुम्ही रडत का आहात? सांगा ना आई, काय झाले?’’ त्यानंतर सासऱ्यांबाबत समजताच ती म्हणाली, ‘‘आई तुम्ही घाबरू नका, बाबांना काहीही होणार नाही. मी काहीतरी करते, असे म्हणत तिने फोन ठेवला आणि लगेचच तिची मैत्रीण शोनाला फोन लावून घडलेला प्रकार सांगितला. बाबांना तातडीने रुग्णालयात घेऊन जा, अशी शोनाला विनंती केली.’’

अपर्णाच्या ज्या मैत्रिणीकडे प्रभाला पाहायलाही आवडत नव्हते आणि तिला ती सतत बंगालन म्हणायची, आज तिच्यामुळेच भरत यांचा जीव वाचला होता. डॉक्टरांचे म्हणणे होते की, मेजर अटॅक होता. रुग्णाला घेऊन येण्यास जरा जरी उशीर झाला असता तर जीव वाचविणे अवघड होते. तोपर्यंत अपर्णा आणि मानवही रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर काही वेळाने रंजोही आपल्या पती व मुलासोबत तेथे आली. मुलगा, सुनेला पाहून जोरजोरात हुंदके देत रडतच प्रभा म्हणाली, आज शोना नसती तर कदाचित तुमचे बाबा जिवंत नसते.

अपर्णाचेही अश्रू थांबत नव्हते. सासऱ्यांना काही झाले असते तर ती स्वत:ला कधीच माफ करू शकली नसती. सासूला मिठी मारत ती म्हणाली, रडू नका, आता सर्व ठीक होईल. शोनाचे तिने मनापासून आभार मानले कारण, तिच्यामुळेच सासऱ्यांचा जीव वाचला होता.

दुसरीकडे आपल्या आईला वहिनीच्या गळयात पडून रडताना बघताच रंजोही रडण्याचे नाटक करीत म्हणाली, ‘‘आई, अगं बाबांना काही झाले असते तर माझाही जीव गेला असता. किती दुर्दैवी आहे मी, जिला तुझा फोन आला, हेच समजू शकले नाही. सकाळी तुझे मिस कॉल पाहिले आणि त्यानंतर तुला फोन लावला तेव्हा कुठे मला सर्व काही समजले. नाहीतर इथे मला कोणी काहीच सांगितले नसते,’’ अपर्णाकडे रागाने बघत रंजो म्हणाली. अपर्णा प्रभाच्या जवळ गेलेली तिला आवडले नव्हते.

ती प्रभाची समजूत काढतच होती तोच तिचा ७ वर्षांचा मुलगा अमोल म्हणाला, आई, तू खोटे का बोलतेस? आजी, ‘‘आई खोटे बोलत आहे. तुझा फोन आला तेव्हा आम्ही टीव्हीवर चित्रपट पाहत होतो. तुझा फोन पाहून आई म्हणाली होती की, माहीत नाही एवढया रात्री कोण मेले जे माझी आई मला त्रास देत आहे. पप्पा तिला म्हणाले, फोन घे, कदाचित एखादी मोठी अडचण आली असेल. तरीही तिने फोन घेतला नाही आणि त्यांनाही घेऊ दिला नाही. ती आरामात चित्रपट बघत राहिली.’’

अमोलचे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रंजोला तर तोंड वर करून पाहणेही अवघड झाले होते. प्रभा कधी आपल्या नातवाकडे तर कधी मुलीकडे एकटक बघत होती.

सत्य बाहेर येताच रंजोला ओशाळल्यासारखे झाले. तिला चांगलाच धक्का बसला होता, त्यामुळे आपल्या मुलाला मारत म्हणाली, ‘‘वेडा कुठला, काहीही बडबड करतो. त्यानंतर उसने अवसान आणत तिने सांगितले, ‘‘आई… अगं दुसऱ्याच कोणाचा तरी फोन होता तो, त्यामुळे मी तसे म्हणाले होते.’’ त्यानंतर समजूत काढत म्हणाली, ‘‘बघ ना आई, काहीही बोलतो हा, त्याला काही कळत नाही. लहान आहे ना.’’

आपण जे काही ऐकले ते खरे आहे, यावर प्रभाचा अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणाली, ‘‘याचा अर्थ तू त्यावेळी जागी होतीस आणि तुझा फोनही तुझ्या जवळच होता. इतक्या रात्री तसेच काही महत्त्वाचे कारण असेल म्हणूनच तुझी आई तुला फोन करीत असेल, असा तू एकदाही विचार केला नाहीस का? चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची. शोना नसती तर आज मी माझ्या सौभाग्याला मुकले असते. ज्या सुनेचे प्रेम मला बेगडी, बनावटी वाटत होत, हे आज मला समजले. तुझ्या मुलाने खरे सांगितले नसते तर मी यापुढेही खोटया भ्रमातच जगत राहिले असते.’’

आपल्या हातून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी निसटून चालली आहे, हे पाहून रंजो उगाचच काकुळतीला येत म्हणाली, ‘‘नाही आई, तू गैरसमज करून घेत आहेस.’’

‘‘गैरसमज झाला होता बाळा, पण आता माझ्या डोळयावरची आंधळया प्रेमाची पट्टी उघडली आहे. तुझे बाबा बरोबर सांगायचे की, तू माझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहेस. तुझ्या मनात माझ्यासाठी थोडेसेही प्रेम नाही.’’ असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवत तिने अपर्णाला सांगितले, ‘‘चल सूनबाई, बघून येऊया, तुझ्या बाबांना काही हवे तर नसेल ना?’’ रंजो, सतत आई, आई अशा हाका मारत होती, पण प्रभाने एकदाही मागे वळून पाहिले नाही, कारण तिचा भ्रमनिरास झाला होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें