फक्त एक साजन हवा

‘‘सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए…’’ एफएमवर वाजत असलेल्या ‘आशिकी’ चित्रपटाच्या या गाण्याने मला अचानक तनूची आठवण आली.

ती जेव्हा कधी एका नव्या प्रेमळ नात्यात अडकायची तेव्हा हेच गाणे गुणगुणायची. मनमौजी… फुलपाखरू… फटाकडी… अशी कितीतरी नावे लोकांनी तिला ठेवली होती. पण ती मात्र ‘पालथ्या घडयावर पाणी’ अशाच अविर्भावात वावरत असे. लोकांनी काहीही म्हटले तरी त्याचा तिच्यावर परिणाम होत नसे. स्वत:च्या अटी-शर्थींनुसार, स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागणारी तनू लोकांसाठी मात्र एक कोडे होती. पण मला माहिती होते की, ती खुल्या पुस्तकासारखी आहे. फक्त ते वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोडया संयमाची गरज होती.

असे म्हणतात की, चांगली पुस्तके आणि चांगली माणसे समजून घ्यायला थोडा जास्त वेळ लागतोच… तनूच्या बाबतही असे म्हणता येईल की, ती नेमकी कशी आहे, हे जरा उशिरानेच समजते.

तनू माझ्या बालपणीची मैत्रीण होती. शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत आणि त्यानंतर नोकरीला लागल्यावरही… ती तिचे प्रत्येक गुपित मला सांगत असे. तिच्या हृदयाच्या छोटयाशा नभांगणात कितीतरी इच्छा, अपेक्षांचे पाखरू स्वत:च्या पंखात असलेल्या बळापेक्षाही कितीतरी मोठी झेप घेण्यासाठी आतूर झाले होते. एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचे तिचे अश्रू क्षणार्धात संपत असे. या मुलीला नेमके काय हवे आहे, हे कधीकधी माझ्याही आकलनापलीकडचे होते.

८ वीत असताना पहिल्यांदा जेव्हा तिने मला सांगितले होते की, ती आमचा वर्गमित्र असलेल्या रवीच्या प्रेमात पडली आहे तेव्हा तिच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच मला समजेनासे झाले. रवीसोबत गप्पा मारणे, खेळणे, मौजमजा करणे तिला मनापासून आवडते, असे तनूने मला सांगितले. तेव्हा तर कदाचित प्रेमाचा नेमका अर्थ काय, हेही आम्हाला नीटसे समजत नव्हते. तरीही न जाणो कशाच्या शोधात ही वेडी मुलगी त्या अनोळख्या मार्गावरून पुढे चालली होती.

एके दिवशी रवीने लिहिलेले प्रेमपत्र तिने मला दाखवले आणि ते पाहून मी घाबरले. मी म्हटले, ‘‘फाडून फेकून दे हे पत्र… चुकून जरी सरांच्या हाती लागले तर तुमच्या दोघांची खैर नाही,’’ असे तिला समजावून सांगत मी तिची मैत्रीण असल्याचे कर्तव्य पार पाडले.

‘‘अगं यात घाबरण्यासारखे काहीच नाही… आयुष्यात एक जिवाभावाचा मित्र असायलाच हवा ना? बस एक सनम चाहीए, आशिकी के लिए…’’ असे हिंदी गाणे गुणगुणत तिने सांगितले.

‘‘तर मग मी तुझी जिवाभावाची नाही का?’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘तुला समजले नाही. जिवाभावाचा मित्र म्हणजे जो माझ्यावर खूप प्रेम करेल. फक्त प्रेम आणि प्रेम… तू मैत्रीण आहेस, मित्र नाहीस…’’ तनूने मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर एके दिवशी प्रचंड रागाने म्हणाली, ‘‘मी रवीचा तिरस्कार करते.’’

मी कारण विचारले असता तिने सांगितले की, आज सकाळी खेळाच्या तासात बॅडमिंटन खेळताना त्याने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

मी म्हटले, ‘‘तुला खूप प्रेम करणारा जिवाभावाचा मित्र हवा होता ना?’’

‘‘माझा प्रश्न ऐकून तनू काहीशी गोंधळली. नंतर म्हणाली, ‘‘हो, हवा होता मला माझ्यावर खूप प्रेम करणारा जिवाभावाचा मित्र, पण हे सर्व तेव्हाच जेव्हा प्रेम करताना त्याच्यासोबत माझी मर्जीही असेल. माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही स्पर्श करू शकणार नाही.’’ असे म्हणत तिने रवीने लिहिलेली सर्व प्रेमपत्रे फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि स्वत:चे हात झटकले.

‘‘वय केवळ १४ वर्षे आणि वागण्याची ही अशी तऱ्हा?’’ मी घाबरून गेले.

९ वीत असताना आम्ही दोघींनी आमची शाळा सोडून मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला. शाळा घरापासून फार लांब नसल्याने आम्ही सर्व मैत्रिणी सायकलवर बसून शाळेत जायचो. १० वीचे आमचे वर्ष सुरू होण्यापूर्वी एके दिवशी तिने मला सांगितले की, ‘‘आपण सायकलवरून शाळेत येताना नेहमी एक मुलगा आपल्या मागून येऊन पुढे निघून जातो. तो मला खूप आवडतो. असे वाटतेय की, मी पुन्हा प्रेमात पडलेय…’’

मी तिला पुन्हा एकदा आगीशी न खेळण्याचा सल्ला दिला. मात्र ती स्वत:च्या मनाशिवाय इतर कुणाचे कधीच ऐकत नसे, त्यामुळे तिने माझे ऐकण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता तर शाळेतून येता-जाताना माझी नजरही त्या मुलावर पडू लागली होती.

शाळेत येताना आणि जाताना तनू त्या मुलाकडे तिरप्या कटाक्षाने एकटक पाहात असे आणि तो मुलगाही तिच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर तनू शेवटचे त्याच्याकडे पाहत असे आणि त्यानंतर तो तिथून निघून जात असे.

वर्षभर त्यांची अशी नजरानजर सुरू होती. त्यानंतर दोघे एकमेकांना प्रेमपत्र देऊ लागले. १-२ वेळा त्यांनी एकमेकांना छोटयामोठया भेटवस्तूही दिल्या होत्या. अनेकदा शाळा सुटल्यावर दोघे गप्पा मारत. पूर्वीप्रमाणेच घडलेली प्रत्येक गोष्ट तनू मला सांगत असे. आता आम्ही दोघी १२ वीत गेलो होतो. मी एके दिवशी तनूला विचारले, ‘‘तुझे हे प्रेम असे किती दिवस चालणार?’’

तनू हसत म्हणाली, ‘‘जोपर्यंत हे प्रेम फक्त प्रेम असेल. ज्या दिवशी माझ्या शरीराकडे तो वाईट नजरेने बघेल तो दिवस आमच्या नात्यातला शेवटचा दिवस असेल.’’

‘‘अगं, अशी मुले रिक्षासारखी असतात. एकाला बोलावले तर कितीतरी समोर येऊन उभ्या राहतात,’’ तनू खटयाळपणे हसत म्हणाली.

तिचा बिनधास्तपणा पाहून मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिले. मी विचारले, ‘‘तनू तुला असे वागताना भीती वाटत नाही का?’’

‘‘यात घाबरण्यासारखे काय आहे? जर हे सर्व करून मला आनंद मिळत असेल तर तो मिळविण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि हो, ही मुले तरी कुठे घाबरतात? मग मी का घाबरायचे? केवळ मुलगी आहे म्हणून?’’ तनू काहीशी रागावली होती. माझ्याकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते.

त्या दिवशी आमच्या शाळेत निरोप समारंभ होता. शाळेच्या नियमानुसार आम्हाला साडी नेसून जायचे होते. लाल काठाच्या मोत्याच्या रंगाच्या साडीमध्ये तनू फारच सुंदर दिसत होती. आम्ही सायकलवरून नव्हे तर टॅक्सी करून शाळेत गेलो. येताना तनूने माझ्या कानात सांगितले की, ‘‘मी आज माझे नाते कायमचे संपवून टाकले.’’

‘‘पण तू तर संपूर्ण वेळ माझ्यासोबतच होतीस. मग त्याला कधी, कुठे आणि कशी भेटलीस?’’ मी आश्चर्याने एका मागून एक प्रश्न विचारू लागले.

‘‘शांत रहा… जरा हळू बोल.’’ तनूने मला गप्प बसायला सांगितले आणि त्यानंतर म्हणाली, ‘‘टॅक्सीतून उतरून तुम्ही सर्व जणी जेव्हा शाळेत जात होता तेव्हा माझी साडी माझ्याच चपलेत अडकली होती, आठवले का?’’

‘‘हो… हो… तू मागेच राहिली होतीस,’’ मी तो क्षण आठवत म्हणाले.

‘‘तो तेथेच उभा होता, टॅक्सी मागे लपला होता. सुरुवातीला त्याची नजर मला न्याहाळत होती. त्यानंतर त्याने माझा हात धरला आणि माझी परवानगी न घेताच मला मिठीत घेतले. तो माझे चुंबन घेणारच होता, पण त्यापूर्वीच मी त्याच्या एक जोरदार कानाखाली लगावली. पाचही बोटे उमटली असतील गालावर…’’ रागाने लालबुंद होत तनू म्हणाली.

‘‘हे मात्र तू अतीच केलेस… अगं इतका तर हक्क आहेच ना त्याला…’’ मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

‘‘नाही, मुळीच नाही. माझ्या शरीरावर फक्त माझा हक्क आहे,’’ अजूनही तनू रागात होती.

त्यानंतर परीक्षा झाल्या. सुट्टी पडली आणि निकाल लागल्यावर नवीन महाविद्यालयीन जीवन सुरू झाले. तो शाळेवेळी दिसणारा मुलगा काही दिवस आमच्या महाविद्यालयाच्या वाटेवरही घुटमळताना मला दिसला, पण तनूने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यानेही त्याचा रस्ता बदलला.

समजतच नव्हते की, कशी होती तनू? तिला प्रेम तर हवे होते, पण त्यात वासनेचा लवलेशही नको होता. महाविद्यालयीन ३ वर्षांच्या जीवनात तिने ३ मित्र बदलले. प्रत्येक वर्षाला एक नवीन मित्र. मी सतत तिला समजावत होते की, कोणाकडे तरी गांभीर्याने बघ. फुलांवर फुलपाखरासारख्या घिरटया कशाला घालतेस?

‘‘फुलांवर घिरटया घालणे हे फक्त भुंग्याचेच काम आहे का? फुलातील मकरंद चाखण्याचा अधिकार फुलपाखरालाही तितकाच असतो…’’ तनू आवेशात बोलत होती.

तनूमध्ये एक खास वैशिष्टय होते की, जोपर्यंत समोरचा त्याच्या मर्यादांचे पालन करत असे तोपर्यंतच ती ते नाते जपायची. त्याने मर्यादांचे उल्लंघन करताच तो तिच्या नजरेतून उतरायचा. त्या नात्यापासून ती लगेच दूर जायची. ‘‘माझ्या मर्जीने माझे सर्वस्व मी कोणाच्याही हाती सोपवेन, पण माझ्या मर्जीविरोधात मी कोणाला माझा साधा हातही पकडू देणार नाही,’’ असे ती मला अनेकदा सांगायची.

महाविद्यालयीन शिक्षण संपवून आता आम्ही नोकरीला लागलो होतो. सध्या मी माझ्या बॉससोबत फिरते, असे तिने मला सांगितले. त्यावेळी ‘‘आतातरी या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने बघ आणि आयुष्याचा जोडीदार निवड,’’ असे मी तळमळीने म्हटले.

‘‘माझ्या साध्याभोळया मैत्रिणी, तू नाही ओळखत या मुलांना. बोट पकडायला दिले तर ते हात पकडतात. गळाभेट घेतली तर थेट बिछान्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मी होकार देऊनही जो स्वत:च्या वासनेवर नियंत्रण ठेवेल, असा मुलगा मला ज्या दिवशी भेटेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन,’’ तनूने सांगितले.

‘‘तर मग कुमारीच रहा, असा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही.’’

त्यानंतर काहीच महिन्यात माझे लग्न झाले. तनूनेही जयपूरमधील नोकरी सोडली आणि मुंबईत नोकरीला लागली. त्यानंतर काही दिवस आम्ही एकमेकींच्या संपर्कात होतो, पण हळूहळू मी संसार, मुलांमध्ये एवढी व्यस्त झाली की तनू माझ्या हृदयाच्या कप्प्यात आठवण बनून राहिली.

आज आशिकी चित्रपटातील गाणे लागताच तनूची प्रकर्षाने आठवण झाली. तिच्याशी बोलावेसे वाटू लागले. ‘तिला तिच्या मनासारखा साजन मिळाला असेल का…,’ असा विचार करीत मी जुन्या डायरीतून तिचा नंबर शोधून लावला, पण तो बंद होता.

‘काय करू? एवढया मोठया जगात तनूला कुठे शोधू?’ असा विचार मनात घोळत असतानाच मला एक कल्पना सुचली आणि मी लॅपटॉपवर फेसबूक सुरू केले. सर्चमध्ये ‘तनू’ असे लिहिताच तनू नावाचे कितीतरी आयडी समोर आले. त्या फोटोंमधील एकीचा चेहरा ओळखीचा वाटला, ती माझीच तनू होती. मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

२ दिवस काहीच उत्तर मिळाले नाही, पण तिसऱ्या दिवशी इनबॉक्समध्ये तिचा मेसेज पाहून मला आनंद झाला. तिने तिचा मोबाईल नंबर दिला होता व रात्री ८ वाजायच्या आधी फोन करायला सांगितले होते. सुमारे ७ वाजता मी फोन केला. तीही कदाचित माझ्याच फोनची वाट पाहात होती.

फोन घेताच नेहमीच्याच बिनधास्त शैलीत तिने विचारले, ‘‘प्रिय मैत्रिणी, कशी आहेस? आज अचानक माझी आठवण कशी झाली? मुले आणि भाओजींमधून वेळ मिळाला का?’’

‘‘अगं बाई, एकत्र एवढे सर्व प्रश्न? जरासा श्वास तरी घे,’’ मी हसतच म्हणाले. त्यानंतर तिला त्या गाण्याची आठवण करून दिली जे ती अनेकदा गुणगुणत असे.

माझे बोलणे ऐकून तनू मोठयाने हसली आणि म्हणाली, ‘‘काय करू मैत्रिणी, मी अशीच आहे. प्रेमवेडया साजनाशिवाय राहू शकत नाही.’’

‘‘अजून तोच प्रकार सुरू आहे का? तुला हवा तसा साजन भेटला नाही का?’’ मी आश्चर्याने विचारले.

‘‘अगं, तुला मी सांगितले नाही का? मी राजीवशी लग्न केले.’’ तनूने नवे गुपित सांगितले होते.

‘‘आपण भेटलोच नाही, मग तू मला कधी सांगणार होतीस? पण मी खूप खुश आहे. अखेर माझ्या मेनकेला विश्वामित्र मिळालाच.’’ मी आनंदाने म्हणाले.

‘‘हो, २ वर्षे आम्ही छान फिरून घेतले. मी त्याला पारखण्याचा बराच प्रयत्न केला. प्रसंगी माझ्या मर्यादांची सीमा लांघून त्याला माझ्या शरीराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. हा नक्की पुरुष आहे ना? असा संशयही मला आला. एखादी मुलगी स्वत:हून इतका पुढाकार घेत असताना तो मात्र ब्रह्मचारी असल्यासारखा वागत होता.’’ तनूच्या बोलण्याची गाडी वेगाने धावू लागली होती. माझीही उत्सुकता वाढली होती.

‘‘हो का? पुढे काय झाले?’’ मी विचारले.

‘‘बहुतेक राजीव आला असे वाटतेय, उरलेल्या गप्पा उद्या,’’ असे म्हणत माझी उत्सुकता तशीच ताणून ठेवून तिने फोन बंद केला.

‘‘अरे वा, हा फारच छान निर्णय आहे तुमचा. माफीचे राहू दे. पुढे काय झाले ते सांग.’’ मी तिला आठवण करून दिली.

पुढे काय घडले सांगताना तनू म्हणाली, ‘‘राजीव माझ्यावर खूप प्रेम असल्याचे सतत सांगायचा, मात्र जेव्हा मी त्याच्या जवळ जात असे तेव्हा स्पष्टपणे सांगायचा की, आपली मैत्री असली तरी शारीरिक संबंध मात्र लग्नानंतरच ठेवणे योग्य आहे. असे संबंध ठेवणे म्हणजे भावी पत्नीचा विश्वासघात करण्यासारखे आहे, असे त्याचे मत होते,’’ तनूने सांगितले.

‘‘खूपच छान. तू तर असाच जोडीदार शोधत होतीस,’’ मी आनंदाने म्हटले.

‘‘हो. त्यानंतर आम्ही लग्न केले.’’

‘‘म्हणजे शेवट गोड झाला,’’ मी खूपच खुश होत म्हटले.

‘‘नाही, खरी कथा तर त्यानंतर सुरू झाली,’’ तनू काहीशी अडखळत म्हणाली.

‘‘आता काय झाले? राजीव खरंच पुरुष नाही का?’’ माझ्या मनाला उगाचच भीती वाटली.

‘‘तो पक्का पुरुष होता.’’ तनूने सांगितले.

‘‘म्हणजे काय?’’ मला काहीच समजेनासे झाले होते.

‘झाले असे की, लग्नाला वर्ष होत नाही तोच मला अस्वस्थ वाटू लागले होते. सवयीनुसार कोणाच्या तरी प्रेमासाठी माझे मन व्याकूळ झाले होते. विवेक आमच्या सोसायटीत नवीन आला होता. माझे मन त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते. सर्वांची काळजी घेण्याचा त्याचा स्वभाव मला आवडू लागला होता. ही गोष्ट एका पतीला आणि त्यातही राजीवसारख्या पतीला कशी काय मान्य झाली असती?’’ तनूने सांगितले.

‘‘पण का? राजीवच्या प्रेमात काही कमी होती का?’’ मी काळजीने विचारले.

‘‘अगं मैत्रिणी, समजून घे. जेव्हा आपण मित्राला पती बनवतो तेव्हा एक चांगला मित्र गमावून बसतो. खूप गोष्टी अशा असतात ज्या आपण पतीला नाही तर फक्त मित्राला सांगू शकतो. माझ्यासोबही असेच घडले. ही मुले लग्नानंतर एवढी भावूक का होतात, हेच मला समजत नाही,’’ तनू आपले मन माझ्याकडे मोकळे करत होती.

‘‘बरं, मग पुढे काय झाले?’’ मी सवयीनुसार कुतूहलाने विचारले.

‘‘काय होणार होते? आमच्या नात्यात दुरावा वाढू लागला. मी विवेकचे नाव घेताच राजीवच्या चेहऱ्यावरील रंग उडून जायचा. माझे विवेकला भेटणे, हसणे, बोलणे त्याला अजिबात आवडत नव्हते. लग्नानंतर पर पुरुषाशी मैत्री करणे म्हणजे चरित्रहीनता, असे त्याचे मत होते. पण मीही माझ्या मनाला समजावू शकत नव्हते. प्रेमाशिवाय मी राहू शकत नव्हते.’’

‘‘पुढे काय झाले?’’

‘‘काय होणार? एके दिवशी मी राजीवचा हात माझ्या हातात घेऊन त्याला विचारले की, अगदी खरं सांग. जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा तुला माझ्या चारित्र्याबद्दल काय वाटायचे? त्याने सांगितले की, माझ्यासारखी ठाम मते असलेली मुलगी त्याने पाहिली नव्हती आणि माझ्या याच स्वभावाच्या तो प्रेमात पडला. मी त्याला समजावले की, जर लग्नाआधी अनेक मुलांसोबत मैत्री करूनही मी माझे कौमार्य अबाधित ठेवले तर मग तो असा विचार करूच कसा शकतो की, माझ्या मैत्रीत पवित्र भावना असणार नाही.’’

‘‘ज्या दिवशी माझ्या एखाद्या मित्राचा हात माझ्या खांद्यावरून पुढे सरकत जाईल त्याच क्षणी मी त्याचा हात झटकून टाकेन. माझ्या शरीरावर आणि मनावर फक्त तुझाच अधिकार आहे, असा विश्वास मी राजीवला दिला. जिवाभावाचा मित्र असल्याशिवाय मी आयुष्यात खुश राहूच शकत नाही, हे त्याला समजावून सांगितले.’’ तनूने सांगितले.

‘‘पुढे?’’

‘‘राजीवच्या हे लक्षात आले की, मी मित्राशिवाय आनंदी राहू शकत नाही आणि जर मी आनंदी नसेन तर त्याला आनंदात कसे ठेवू शकेन?’’ तनू म्हणाली.

‘‘बरं झालं,’’ मी आनंदाने म्हणाले.

‘‘त्यानंतर त्याने मला विवेकशी मैत्री करण्यापासून रोखले नाही. मीही त्याला वचन दिले की, जेव्हा तो माझ्या सोबत असेल तेव्हा त्या वेळेवर फक्त त्याचा हक्क असेल.’’ तनूने तिचे बोलणे पूर्ण केले.

यापुढेही संपर्कात राहू, असे ठरवून आम्ही फोनवरील संभाषण थांबवले. तनूने फोन ठेवला होता, पण मी अजूनही माझा मोबाईल कानाला तसाच लावून विचार करीत होती की, खरंच खूप धीट आहे तनू. तिच्या म्हणण्यात तथ्य आहे. आयुष्यात असा एखादा जिवाभावाचा मित्र असायलाच हवा जो आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करेल. त्यात वासना नसेल. आपल्यातील सर्व वाईट गोष्टींसह आपला स्वीकार करेल. ज्या गोष्टी पतीला सांगणे शक्य नाही त्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी आपण त्याला सहजपणे सांगू. अगदी पतीबाबत असलेली गुपितेही.

आपण बायका आयुष्यभर आपल्या पतीमध्ये मित्र शोधत असतो, पण पती हा पतीच असतो तो मित्र बनू शकत नाही.

विध्वंस

कथा * राधिका साठे

आता हळूहळू सगळंच पूर्वपदावर येऊ लागलं होतं. गेला आठवडाभर ज्या ऑफिसमधून कामं बंद पडली होती, ती ऑफिसं आता सुरू झाली होती. रस्त्यांवरून सुसाट वेगानं धावणाऱ्या गाड्या रडत-खडत, उखडलेल्या, खचलेल्या रस्त्यांवरून चालू लागल्या होत्या. रस्त्याच्या कडेला हॉकर्सनी पुन्हा आपली दुकानं मांडायला सुरूवात केली होती. रोज मजूरी करून पोट भरणारे मजूर आणि घरकाम करणाऱ्या मोलकरणीही पुन्हा रस्त्यांवर दिसू लागल्या होत्या.

गेल्या आठवड्यात चेन्नईत चक्रीवादळानं केलेला विध्वंस सगळीकडे आपली छाप ठेवून होता. अजूनही अनेक भागांमधलं पाणी ओसरलं नव्हतं. खोलगट भागातल्या वस्त्या अजूनही पाण्याखाली होत्या. एयरपोर्ट अजून सुरू झाला नव्हता. मधल्या काळात रस्त्यांवर कंबरभर पाणी होतं. नेटवर्क बंद होतं. फोन, वीज, जीवनावश्यक वस्तू काही म्हणता काहीच नव्हतं. गाड्यांच्या इंजिनात पाणी भरल्यामुळे लोक गाड्या तिथंच टाकून जीव वाचवून पळाले होते. काही ऑफिसमधून सायंकाळी निघालेले लोक कसेबसे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी पोहोचू शकले होते. कॉलेज, होस्टेल्स आणि युनिव्हसिर्टीत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना लष्कराच्या मदतीनं बाहेर काढलं गेलं.

चेन्नई तसंही समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं शहर आहे. इथं अनेक सरोवरंही आहेत, पण त्याच्यावर अतिक्रमणं करून रस्ते आणि बिल्डिंगांची बांधकामं उभी केली गेली. या सात दिवसात त्या सरोवरांनी जणू आक्रोश करून आपला कोंडून घातलेला श्वास मोकळा केला असावा असं सगळं दृष्य दिसत होतं. शहराची पार दुर्दशा झाली होती.

गरीबांच्या वस्त्या झोपडपट्ट्या खोलगट भागात असल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच वाईट होती. कुठंतरी कशीबशी रात्र काढल्यावर सकाळी उपाशी पोराबाळांचा अन्नासाठी अक्रोश सुरू झाल्यावर त्यांनी समोर दिसलेल्या दुकानावर हल्लाच चढवला. भूक माणसाला चोर आणि आक्रमक बनवते.

रात्रीचे अकरा वाजले होते. जिथं जागा मिळेल तिथं लोक जीव वाचवण्यासाठी उभे होते. पाऊस कोसळत होता अन् सगळीकडे पाणी तुंबायला सुरूवात झाली होती. ऑफिसातून पायी चालत निघालेली रिया पाऊस पाण्यात अडकली होती. एका स्टोअर्सच्या पार्किंगला ती कशीबशी उभी होती. अजून काही लोक तिथं होते. तेवढ्यात दारू प्यायलेले काही तरूण तिथं आले. तरूण मुलगी बघून ते काही बाही बरळायला लागले. इथं आपण सुरक्षित नाही हे रियाला कळलं. पण तिथून अजून कुठं निघून जाणं तिला शक्यही नव्हतं. तिथं असलेली इतर माणसंही हे सगळं कळून काहीच न कळल्याचा आव आणून उभी होती. कारण दारू ढोसलेल्या गुंडांशी लढणं त्यांना शक्य नव्हतं. कोसळणारा पाऊस, उसळणारा समुद्र आणि समोर हे मानवी देहाचे लांडगे…रिया फार घाबरली होती.

आता त्या मुलांपैकी एक तर रियाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. रियानं स्वत:ला अधिकच आक्रसून घेतलं. ती आकाशच्या जवळ सरकली.

गर्दीत उभ्या असलेल्या आकाशला रियाची कुचंबणा कळली. तो त्या मवाल्यांना म्हणाला, ‘‘भाऊ, का त्रास देताय तुम्ही यांना. आपणच या परिस्थितीमुळे त्रस्त आहोत…आणि तुम्ही एका असहाय मुलीला त्रास का देत आहात?’’

एवढं बोलायचा अवकाश…त्या पोरांची टाळकी सटकलीच! एक जण बोलला, ‘‘तू कोण लागतोस रे हिचा?  आणि कोण आहे तुझी? फार काळजी घेतो आहेस तिची?’’ मग त्यानं चक्क तिला हातच लावला, वर निर्लज्जपणे म्हणाला, ‘‘हात लावल्यानं झिजणार आहे का ती? बोल, काय करशील? अजून हात लावेन…मिठीत घेईन…बघूया काय करतोस ते?’’

इतके लोक होते तिथं, पण जिवाच्या भीतिनं कुणी एक समोर येईना. सगळे गुपचुप उभे होते. मनातून सगळेच घाबरलेले होते.

रिया खूपच घाबरली. ती थरथर कापत होती. आकाशच्या मागे दडून उभी राहिली. तोच तिचा एकमेव आधार होता.  आता तर त्या बेवड्यांना ऊतच आला. ते आणखी चेकाळले.

घाबरलेल्या रियाला धीर देत आकाशनं म्हटलं, ‘‘तुम्ही घाबरू नका. मी आहे तोवर तुम्ही सुरक्षित आहात.’’

रियाला रडू फुटलं, त्यातल्या एकानं आता आकाशवर हल्ला चढवला. आकाश पूर्ण शक्तिनिशी त्याचा प्रतिकार करू लागला.

तेवढ्यात गर्दीतले काही लोक आकाशच्या मदतीला धावले. काहींनी रियाभोवती कडं करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आकाशला मदत मिळाल्यामुळे आता त्या दारूड्यांना ही लढाई जड जात होती. त्याच्यामुळे आज त्यांची शिकार हातातून निसटल्याचा संताप आता त्यांना अनावर झाला होता.

ते अर्वाच्च शिव्या देत होते. तेवढ्यात एकानं सुरा काढला अन् आकाशच्या छातीवर सपासप वार केले. तेवढ्यात लष्कराचे जवान तिथं पोहोचले अन् त्या गुंडांनी पोबारा केला. सुरीहल्ला बघून गर्दीतले लोक अवाक्च झाले. जवानांनी ताबडतोब नावेत घालून आकाशला इस्पितळात हलवलं. पण फार जास्त रक्त वाहून गेल्यामुळे आकाशची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आकाश मुळचा मुंबईचा. त्याचं कुटुंब मुंबईतच होतं. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. मुंबईच्या ऑफिसनं सहा महिन्यांसाठी त्याला चेन्नईला पाठवलं होतं. मी ही त्याच कंपनीत काम करत असल्यामुळे आमची ओळख होती. कंपनीत बातमी आली अन् आम्ही सगळेच प्रथम अवाक् झालो. खूप हळहळ वाटली. कंपनीतल्या आणखी एका सहकाऱ्यासोबत मी मुंबईला त्याच्या घरी भेटायला गेले. कुठल्या तोंडानं अन् कोणत्या शब्दांत मी त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करणार होते.

मुंबईला आकाशच्या घरात हाहाकार उडाला होता. मुलं केविळवाणी कोपऱ्यात रडत बसली होती अन् त्याची तरूण बायको तर पार उध्वस्त झाली होती. तिची स्थिती बघवत नव्हती. मी मनातल्या मनात विचार करत होते, चांगल्या कामाचं खरं तर बक्षीस मिळतं मग आकाशला ते का मिळालं नाही? त्याला व त्याच्या कुटुंबाला कुठल्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा मिळाली? एका असहाय मुलीला गुंडापासून वाचवण्याचं हे बक्षिस? अखेरीस का?

दगडालाही पाझर फुटेल असा आकांत त्या घरात चालला होता. त्याच्या पत्नीच्या अश्रूंमध्ये सगळं शहर वाहून जाईल असं वाटत होतं. चेन्नईतलं लोकजीवन आता हळूहळू मार्गावर येत होतं. पण मुंबईतल्या आकाशच्या घराची परिस्थिती कधी अन् कशी बदलणार होती? चेन्नईतल्या गुदमरलेल्या सरोवरांनी आपला हक्क हाहाकार माजवून मिळवला होता. पण आकाशची बायको कुणाजवळ हक्क मागणार? तिच्या झालेल्या नुकसानांची भरपाई कोण, कशी करणार? पत्नीला तिचा पती आणि मुलांना त्यांचा पिता परत मिळू शकेल का?

स्वार्थी प्रेम

कथा * जोगेश्वरी सधीर
खरं तर दीपाली दिसायला सुंदर होती. तिचं लग्न ठरण्यात कोणतीची अडचण
यायला नको होती. पण का कोण जाणे तिच्या आईवडिलांना त्यांच्या समाजातला
कुणी मुलगा पसंतच पडत नव्हता. देखण्या दीपालीचं लग्नाचं वय बघता बघता
निघून गेलं. वडील कॉलेजात प्रिन्सिपॉल होते. त्यांना कुणी योग्य मुलगा दिसतच
नव्हता.
शेवटी दीपालीनं एका गुजराती मुलाशी सूत जमवलं. अरूणचं अन् तिचं
प्रेमप्रकरण तीन चार वर्षं सुरू होतं. दीपालीचे वडील एव्हाना अंथरूणाला खिळले
होते. त्यांनी दीपालीला प्रेमविवाहाची परवानगी दिली.
दीपालीच्या लग्नासाठीच जणू वडिलांचे प्राण अडकले होते. तिचं लग्न झालं अन्
त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरूणचं दीपालीवर मनापासून प्रेम होतं. त्यानं
अत्यंत सन्मानानं दीपालीला आपल्या घरी आणलं. घरातलं वातावरण कट्टर
गुजराती होतं. घरचा चांगला व्यवसाय होता. आर्थिक बाजू भक्कम होती. पण
सासूचा, कांतीबेनचा स्वभाव काही फटकळ दीपालीला आवडत नव्हता. अरूणचं
आभाळभर प्रेम मिळत असूनही तिची चिडचिड चालू असायची.
कांतीबेन अन् नारायण भाई हे जोडपं अत्यंत सरळमार्गी होतं. सामान्यपणे
गुजराती कुटुंबात सुनेनं साडी नेसावी, डोक्यावरून पदर घ्यावा. तोकडे, लांडे कपडे
घालू नयेत असे संकेत असतात. आपल्या सुनेनं ते पाळावेत अशी कांतीबेनची
अपेक्षा असणं यात गैर काहीच नव्हतं.

अरूण दीपालीला शांतपणे समजवायचा. थोडं धीरानं घे. सगळं चांगलं होईल
म्हणून सांगायचा पण हट्टी अन् मानभावी दीपालीला ते मान्य नव्हतं. एक
दिवस चिडून, भांडण करून ती माहेरी निघून गेली. आईनंही तिला समजूत घालून
परत पाठवण्याऐवजी उलट तिला अधिक भडकण्यातच धन्यता मानली.
दीपालीची बहीण राजश्री तर स्वत:च्या संसाराचा खेळखंडोबा करूनच बसली
होती. आता दीपालीच्या बाबतीतदेखील तिनं आगीत तेल ओतायचं काम सुरू
केलं. सासूला चांगली अद्दल घडवूया असं ती दीपालीला सांगायची.
मूर्ख दीपालीनं आई व बहिणीच्या सांगण्याप्रमाणे अरूणचं प्रेम ठोकरलं. बिचारा
अरूण किती वेळ यायचा. घरी चल, प्रेमानं संसार करू म्हणून विनवायचा पण
दीपाली ढम्म होती.. अरूणचं प्रेम तिला कळतंच नव्हतं. तिच्या आईलाही
विवाहित मुलगी माहेरी येऊन राहते याचं काही वाटत नव्हतं.
माहेरी दीपाली फक्त आराम करायची. दिवसभर तिची वहिनी एकटीच घरातली
कामं करत असायची. आई अन् दीपाली सकाळ संध्याकाळ भटकायला जायच्या.
घरात अन् बाहेर मनसोक्त हादडायच्या.
शरीराला कोणतीच हालचाल नसल्यानं अन् दिवसभर चरत राहिल्यानं दीपाली
आता चांगलीच गरगरीत झाली होती. अरूणला ओळखणाऱ्या लोकांना दीपालीचा
राग यायचा आणि अरूणची कीव यायची. दीपालीच्या ओळखीतले, नात्यातले
लोकही तिला टाळायला बघायचे. कारण अरूणचा चांगुलपणा त्यांनाही दिसत
होता. वारंवार तो तिला येऊन भेटत होता, घरी चल म्हणत होता ही गोष्ट
लोकांपासून लपून राहिलेली नव्हतीच.
दीपाली मजेत खातपीत, भटकंत होती. अरूण मात्र बायको सोडून गेल्यामुळे फार
दु:खी होता. त्याच्या आईवडिलांनादेखील वाटायचं. मुलाचा संसार बहरावा, आपण
नातवंडं खेळवावीत. पण हट्टी दीपाली सासरी गेलीच नाही. अरूणनंही आता
तिला भेटणं कमी केलं. फोन मात्र तो आवर्जून करायचा. अरूणनं दीपालीकडे

घटस्फोट मागितला नाही. त्याचं इतर कुठं प्रेमप्रकरण नव्हतं. आढयतेखोर
दीपाली घरी येत नव्हती. घटस्फोट देऊन अरूणला मोकळंही करत नव्हती.
अरूणचं मात्र दीपालीवर मनापासून अन् खरंखुरं प्रेम होतं. दीपालीशिवाय तो इतर
कुणाचा विचारही करू शकत नव्हता. बिचारा एकटाच आयुष्याचा आला दिवस
ढकलत होता. हल्ली त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नसायची. एकटाच आपल्या
विचारात दंग असायचा. एक दिवस असाच आपल्या नादात दुकानातून निघून
घरी येत असताना एका ट्रकशी त्याच्या कारचा अपघात झाला. डोक्याला फार
मोठी जखम झाली.
नारायण भाई अन् कांतीबेननं दीपालीला त्याच्या अपघाताची बातमी दिली. ती
भेटायला येईल असं त्यांना वाटत होतं. पण दीपाली काय किंवा तिची बहिण
अन् आई काय कुणीही त्याला बघायला इस्पितळात गेलं नाही. उलट त्या
परीस्थितीत दीपालीच्या आईनं अरूणच्या वडिलांना सांगितलं की दीपाली व
अरूणसाठी वेगळा ब्लॉक करून द्या.
अरूणचा अपघात जबरदस्त होता. तो त्यातून वाचला हेच नशीब. एवढी गंभीर
दुखापतही तो शांतपणे सोसत होता. आईवडिल त्याची सेवाशुश्रुषा करत होते. त्या
सगळ्या गडबडीत दीपालीसाठी वेगळा फ्लॅट घेणं, तो सजवून, सामानानं परीपूर्ण
करून घेणं, नारायणभाईंना जमलंच नाही.
एकुलत्या एक मुलाच्या सुखासाठी आईवडिल त्याचं वेगळं घर मांडून द्यायलाही
तयार झाले होते. पण निदान दीपालीनं येऊन नवऱ्याला भेटावं. त्याच्याजवळ
बसावं एवढी त्यांची इच्छाही त्या स्वार्थी मुलीला पूर्ण करावी असं वाटलं
नाही.काही महिने इस्पितळात काढून अरूण घरी आला. या काळात दीपाली
फक्त आपल्या नव्या फ्लॅटबद्दल चौकशी करत होती. जखमी, दुर्बळ झालेल्या
नवऱ्याला, तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अरूणला भेटावं असं तिला
एकदादेखील वाटलं नाही.

अरूणला घरी आणल्यावर त्याचे वडिल त्यांच्या वेगळ्या फ्लॅटच्या व्यवस्थेला
लागले. वेगळं घर करून का होईना मुलाचा संसार सुखाचा होऊ दे, तो आनंदात
राहू दे एवढंच त्यांना वाटलं होतं.
पण अरूणला हे कळलं, तेव्हा त्याचं मन फारच दुखावलं. ज्या दीपालीवर आपण
वेड्यासारखं प्रेम केलं, ती दीपाली इतकी आत्ममग्न अन् स्वार्थी असावी हे त्याला
सहनच होईना. तो अगदी मिटून गेला. त्याचं हसणं, बोलणं कमी झालंच होतं, ते
आता पूर्णपणे बंद झालं. इतक्या महिन्यांत त्यानं दीपालीला फोन केला नव्हता.
तिनंही फोन केला नाही, येणं तर दूरच!
यापुढे तरी नव्या फ्लॅटमध्ये येऊन दीपाली सुखानं नांदेल याची त्याला शाश्वती
वाटेना. दीपालीवरच्या त्याच्या एकतर्फी का होईना, निस्सीम प्रेमामुळेच तो एवढे
दिवस जिवंत होता, पण आता त्याच्या मनांत फक्त निराशा होती. आयष्यातून
दीपाली गेली तरी त्याच्या मनांतली प्रेम भावना जिवंत होती. आता मात्र ते प्रेम
पार आटलं, नाहीसं झालं. आता त्याच्या जगण्याला काही अर्थच नव्हता.
हातापायाच्या जखमा आता बऱ्यापैकी भरून झाल्या होत्या. डोक्यावरचं बँडेज
मात्र अजूनही होतंच. विचार करून त्याचं डोकं भणभणत होतं. रात्री झोप
लागेना. आईवडिल शेजारच्या खोलीत झोपले होते.
तिरीमिरीत अरूण उठला अन् खोलीतून जिन्याकडे निघाला. अंधारात पायरी
दिसली नाही अन् तो जिन्यावरून गडगडत थेट खाली पोहोचला. क्षणार्धांत जीवन
ज्योत मालवली.
अत्यंत गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या अरूणला भेटायला दीपाली गेली
नव्हती, मात्र त्याच्या मृत्युची बातमी कळताच ती आपली आई, भाऊ, बहीण व
भाओजींना घेऊन नवऱ्याच्या संपत्तीतला वाटा मागायला आली.

तिच्या निर्लज्जपणानं सगळेच चकित झाले होते. एक गरीब स्वभावाच्या सज्जन
मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या त्या स्वार्थी, आप्पलपोट्या मुलीला बघून
सगळ्यांच्याच मनांत येत होतं की त्या निरागस मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश
करून ही बया सासू सासऱ्यांकड संपत्तीतला वाटा कशी मागू शकते? यालाच प्रेम
म्हणतात? असा प्रेमविवाह असतो?

सायोनारा

कथा * शकुंतला सिन्हा

देवेंद्र ऊर्फ देवचं पोस्टिंग त्यावेळी झारखंड राज्यातल्या जमशेदपूरच्या टाटा स्टील इंडस्ट्रीजमध्ये होतं. तो इंजिनीयर होता. मुळचा पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातला, पण त्याच्या वडिलांचा जमशेदपूरला बिझनेस होता. जमशेदपूरला टाटा नगरी म्हणतात. तिथल्या बिष्ठुपुर भागातच त्यांचं कापड दुकान होतं.

देवचं शिक्षण तिथंच झालेले. इंजिनीयरिंग रांचीतून केलं. कॅम्पस इंटरव्हयूमध्ये लगेच नोकरीही मिळाली. तीही टाटा स्टीलमध्येच. इतर दोन तीन ऑफर्स होत्या त्याला, पण इथल्या रेखीव वसाहती, दलमा टेकडी, स्वर्णरेखा नदी अन् ज्युबिली पार्कचंही आकर्षण होतंच. शिवाय आईवडिलही होतेच.

खरकाई नदीच्या पलीकडे आदित्यपुरला त्याच्या वडिलांची मोठी हवेली होती. पण कंपनीनं त्याला इथंच ऑफिसर्स फ्लॅट्समध्ये एक छानसा फ्लॅट दिला होता. त्याला शिफ्ट ड्यूटी असायची. बऱ्याचदा रात्रपाळी करावी लागे. त्यामुळे त्यानं इथंच राहणं पसंद केलं होतं. त्यामुळे त्याचे आईवडिलही हवेलीचा काही भाग भाड्यानं देऊन इथंच त्याच्या फ्लॅटवर राहायला आले होते.

याच दरम्यान टाटा स्टीलच्या आधुनिकीकरणाचा प्रोजेक्ट आला. जपानच्या निप्पोन स्टीलच्या तांत्रिक सहयोगानं टाटा कंपनी आपल्या फोल्ड रोलिंग मिल आणि कंटिन्यूअस कास्टिंग शॉपच्या निर्मितीत गुंतली होती. देव सुरूवातीपासूनच या प्रोजेक्टमध्ये होता. जपानहून निप्पोन कंपनीनं काही टेक्निकल एक्सपर्र्ट्सही टाटा नगरीला पाठवले होते. ही मंडळी टाटा स्टीलच्या वर्कर्स आणि इंजिनीयर्सना टे्निंग देण्यासाठी आलेली होती. त्याच्यासोबत काही दुभाषीही होते. जे जपानीचं इंग्रजीत भाषांतर करून इथल्या लोकांना समजावून सांगत होते. त्या टीममध्येच अंजूही होती. जपानी व इंग्रजीवर तिचं प्रभुत्व होतं. वीस वर्षांची सुंदर तरुणी, मुख्य म्हणजे तिचे फीचर्स जपानी वाटत नव्हते. जवळजवळ सहा महिने हे सर्व तिथे राहिले. या दरम्यान अंजू व देवची चांगली ओळख झाली होती. देव तिला भारतीय पदार्थ खाऊ घालायचा. कधीतरी तीही त्याला जपानी पदार्थ करून खाऊ घालायची. इथलं काम संपवून ती सहा महिन्यांनी जपानला निघून गेली.

तिला निरोप द्यायला देव कोलकत्त्याच्या विमानतळावरही गेला होता. त्यानं तिला एक संगमरवरी ताजमहाल अन् बौद्धगयेतील बुद्ध मंदिराचा फोटो भेट म्हणून दिला. ही भेट बघून अंजूला खूप आनंद झाला. निरोप घेताना शेकहॅण्ड करत देवने म्हटलं ‘‘बाय…बाय…’’

अंजूनं हसून म्हटलं, ‘‘सायोनारा…’’ अन् ती एअरपोर्टच्या दरवाजातून आत गेली.

काही दिवसांनी नवीन काहीतरी शिकण्यासाठी टाटा स्टीलनं आपली एक टीम जपानला पाठवली. तिथल्या ओसाका फ्लॅटमध्येच हे टे्निंग होतं. या टीममध्ये देवचा समावेश होता. योगायोगाने इथंही दुभाषी म्हणून अंजूच आलेली होती. अवचित भेटल्यामुळे दोघांनाही आनंद झाला. एरवी टे्रनिंग खूपच टफ होतं. पण वीक एंडला दोघं भेटायची. एकत्र कॉफी घ्यायची.

बघता बघता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता टे्निंग संपायला थोडेच दिवस उरले होते. देवनं म्हटलं, ‘‘जवळपास बघण्यासारखं काही असेल तर दाखव ना?’’

‘‘हो, इथून हिरोशिमा जवळच आहे. बुलेट टे्ननं दोन तासातच पोहोचता येईल.’’

‘‘मला जायचंय तिथं. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं तिथंच अणुबॉम्ब टाकला होता ना?’’

‘‘होय, सहा ऑगस्ट १९४५ त्या अभद्र दिवशीच ती घटना घडली. कोणताही जपानी, जपानीच काय पण सारं जग ती घटना विसरणार नाही. माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, सुमारे ऐंशी हजार लोक एका क्षणात मृत्यूमुखी पडले होते अन् पुढल्या चारच महिन्यात ही संख्या एक कोटी एकोणपन्नास लाख एवढी झाली होती.’’

‘‘खरोखरंच फार दुर्देवी घटना होती ती. जगात पुन्हा कुठेच असं काही घडता कामा नये.’’

‘‘परवाच सहा ऑगस्ट आहे. मीही चलते तुझ्यासोबत. जपानी लोक या दिवशी शांतता स्थापित व्हावी म्हणून तिथं प्रार्थना करतात,’’ अंजूनं म्हटलं.

दोन दिवसांनी दोघंही हिरोशिमाला गेली. तिथं दोन दिवस थांबली. तिथल्या पीसपार्कमध्ये प्रार्थना केली. मग दोघंही हॉटेलात गेली. लंचमध्ये अंजूनं स्वत:साठी लेडीज ड्रिंक शोंचू ऑर्डर केलं. तिने देवला विचारलं, ‘‘तू काय घेणार?’’

‘‘आज मीदेखील शोंचू टेस्ट करून बघतो. दोघंही सोफ्यावर बसून जेवत होती. एकमेकांच्या खूपच जवळ आली होती.. अंजूनं त्याला किस केलं अन् म्हणाली, ‘‘एशिते इमासू.’’

देवला काहीच कळलं नाही. तेव्हा तिनं सांगितलं याचा अर्थ ‘‘आय लव्ह यू.’’

त्यानंतर दोघंही जणू या जगात नव्हतीच. त्यांच्यामधलं द्वैत कधी संपलं ते दोघांनाही समजलं नाही.

तिच्यापासून दूर होताना देव म्हणाला, ‘‘अंजू, तू मला जे सुख दिलंस…खरं तर मीच तुला प्रपोज करणार होतो.’’

‘‘मग आता कर ना? खरं तर मी लाजायला हवं, तर तूच लाजतो आहेस…’’

‘‘ही घे अंगठी,’’ आपल्या बोटातली अंगठी काढत देवनं म्हटलं, ‘‘सध्या यावरच भागवूयात.’’

‘‘नको, नको,’’ त्याला अडवत अंजू म्हणाली, ‘‘तू प्रपोज केलंस, मी होकार दिला…मला अंगठी नकोय…ती तुझ्या बोटातच राहू दे.’’

‘‘ठीक आहे. टे्निंग संपताच भारतात परत गेलो की आईबाबांना सगळं सांगतो. मग तूच तिथं ये. आपलं लग्न भारतीय पद्धतीनंच होईल,’’ देवनं म्हटलं.

‘‘मी त्या दिवसाची आतुरतेनं वाट बघते,’’ अंजू म्हणाली.

टे्निंग संपवून देव भारतात परत आला. इकडे त्याच्या गैरहजेरीत त्याच्या आईबाबांनी त्याचं लग्न ठरवून ठेवलं होतं. देव त्या मुलीला ओळखत होता. तिचे वडिल व देवचे वडिल पक्के मित्र होते. दोन्ही कुटुंबांचा खूप घरोबा होता. मुलीचं नाव अजिंदर होतं. ती पंजाबी होती. तिच्या वडिलांना धंद्यात खूपच नुकसान झाल्यामुळे त्यांनी आत्महत्त्या केली होती. ते कुटुंब त्या दु:खात अन् धक्क्यात असतानाच देवच्या आईबाबांनी अजिंदरच्या आईला सांगितलं होतं की अजिंदरला आम्ही सून करून घेऊ.

देवला जेव्हा अजिंदरशी लग्न ठरवल्याचं कळंलं तेव्हा त्यानं या गोष्टीला नकार दिला. ‘‘आई, माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी अजिंदरसोबत लग्न करू शकत नाही.’’ त्यानं सांगितलं.

‘‘पण तिच्यात वाईट काय आहे? अन् तू कोणती मुलगी पसंत केली आहेस?’’ बाबांनी विचारलं.

‘‘ती जपानी मुलगी अंजू…आपल्याकडे आली होती. आठवतंय का?’’

‘‘देव, त्या परदेशी पोरीशी तू लग्न करणार? आम्हाला हे अजिबात मान्य नाही. आपल्या देशात मुलींचा दुष्काळ पडलाय का? आम्ही अजिंदरच्या आई व आजीला वचन दिलंय.’’ बाबा भडकून म्हणाले.

‘‘बाबा, मी ही…’’

‘‘अजिबात काही बोलू नकोस, तुला इथे आईवडिल जिवंत बघायचे असतील तर तुला अजिंदरशी लग्न करावं लागेल.’’ बाबांनी धमकीच दिली.

काही वेळ सगळेच शांत होते. मग बाबा म्हणाले, ‘‘देव, तू जर आमचं ऐकलं नाहीस तर मीही अजिंदरच्या बापाप्रमाणे आत्महत्या करेन. त्या मृत्युसाठी तूच सर्वस्वी जबाबदार असशील.’’

‘‘छे छे, भलतंच काय बोलताय,’’ देवच्या आईनं म्हटलं.

‘‘आता सगळं तुझ्या लाडक्या पोरावर अवलंबून आहे,’’ एवढं बोलून बाबा तिथून निघून गेले.

शेवटी देवला आईबाबांचं ऐकावंच लागलं.

देवनं आपली सगळी परिस्थिती अन् असहायता अंजूला कळवल्यावर ती समजूतदारपणे म्हणाली की त्यानं अजिंदरशीच लग्न करणं योग्य ठरेल.

अंजूनं देवला जरी अगदी सहजपणे मुक्त केलं होतं तरी ती मात्र फारच अडचणीत सापडली होती. देवपासून तिला दिवस गेले होते. अजून एकच महिना झाला होता. पण तिनं देवला हे काहीच कळवलं नाही. त्याला कशाला उगीच काळजी अन् अपराधबोध.

पुढच्याच महिन्यात देवचं लग्न होतं. त्यानं अंजूला लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं. तिनंही येते म्हणून कळवलं.

अगदी मोकळ्या मनानं अंजू देवच्या लग्नात सहभागी झाली. पण तिला वरचेवर उलट्या होत होत्या. ‘‘तुला बरं नाहीए का?’’ देवनं विचारलं.

‘‘बरी आहे मी…पण विमान प्रवासाचा थोडा त्रास अन् लग्नाचं हे जड जेवण यामुळे मला बरं वाटत नाहीए.’’

लग्नानंतर तिनं देवला म्हटलं की तिला बोधगयेला जायचंय.

देव म्हणाला, ‘‘मी व अजिंदरही येतो,’’ त्यानं गाडी बुक केली व तिघंही एकत्रच बोधगयेला गेले. अंजूनं आधीच गोळ्या वगैरे घेतल्यामुळे तिला प्रवासाचा त्रास झाला नाही. रात्री तिघंही एकाच रूममध्ये राहिले. कारण अजिंदरचाच आग्रह होता, ‘‘पुन्हा केव्हा अशी संधी मिळणार. आज एकत्र राहू व पोटभर गप्पा मारू.’’

गयेतून अंजू जपानला गेली. देव व अजिंदरनं तिला विमानतळावर सोडलं. निरोप घेताना दोघांनी तिला बाय केलं. तिनंही हसून ‘सायोनारा’ म्हटलं संपर्कात राहा, असंही सांगितलं.

लग्नानंतर दहा महिन्यातच अजिंदरला मुलगा झाला. त्याच्या दोन महिने आधी अंजूला मुलगी झाली होती. तिचा चेहरा अगदी देवसारखा होता. इकडे देवचा मुलगाही हुबेहुब देवसारखाच होता. त्यानं अंजूला आपल्याला मुलगा झाल्याचं कळवलं होतं, पण अंजूनं मात्र त्याला मुलीबद्दल काहीच कळवलं नव्हतं. अजिंदर, अंजू व देवचा इंटरनेटवर संपर्क होता. ती त्याच्या मुलाला गिफ्ट पाठवायची. लग्नाच्या वाढदिवसालाही भेटवस्तू द्यायची.

देव तिला म्हणायचा, ‘‘तू लग्न कर…मला तुला काही भेटवस्तू द्यायला निमित्त हवं ना?’’

ती उत्तर टाळायची. एकदा म्हणाली, ‘‘मी माझ्या आजीकडेच वाढले कारण आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. मला लग्न करण्याची इच्छा नाहीए. पण मी एक मुलगी दत्तक घेतली आहे. एकल पालक म्हणून तिला वाढवते आहे.’’

देवनं मग फार काही विचारलं नाही. फक्त विचारलं, ‘‘मुलीचं नाव काय आहे?’’

‘‘तिचं नाव किको आहे. किकोचा अर्थ ‘आशा’ असा आहे. तिच माझ्या आयुष्याची एकमेव आशा आहे.’’

‘‘तिचे फोटो पाठव ना?’’ अजिंदरनं म्हटलं.

‘‘पाठवेन…’’ अंजू म्हणाली.

काळ पुढे पुढे जात होता. देवचा मुलगा व अंजूची मुलगी एव्हाना सात वर्षांची झाली होती. एक दिवस अंजूचा ई मेल आला. निप्पोन कंपनी एक इंजिनियर व टेकनियन्सची टीम टाटाला पाठवते आहे. त्यांच्याबरोबर इंटरप्रिटर म्हणून अंजली येते आहे.

ठरल्याप्रमाणेच अंजू आली. शिवमसाठी खूप गिफ्ट आणल्या होत्या.

‘‘किकोला का नाही आणलंस?’’

‘‘एक तर तिला व्हिसा मिळाला नाही. शिवाय शाळा बुडाली असती. माझ्या एका मैत्रीणीजवळ सोपवून आले आहे. तिची मुलगी किकोची खास मैत्रीण आहे,’’ अंजूनं म्हटलं.

अंजूच्या टीमचं काम दोन अडीच आठवड्यात आटोपलं. ती परत जाणार होती. त्याच्या आदल्या दिवशी देवकडे डिनरला आली. तिघांनी खूप गप्पा मारल्या. हसत खेळत जेवण झालं.

दुसऱ्यादिवशी अंजू टे्ननं कोलकत्त्याला जाणार होती. रेल्वेस्टेशनवर अजिंदर व देव तिला सोडायला गेली.

टे्रन सुटता सुटता अंजूनं आपल्या बॅगेतून एक मोठासा बॉक्स काढून अजिंदरला दिला.

‘‘हे काय? सध्या तर गिफ्ट घेण्यासारखा काहीच प्रसंग नाहीए?’’ तिनं म्हटलं.

‘‘घरी जाऊन बघ.’’ अंजू म्हणाली. टे्रन सुरू झाली. हात हलवून अंजूनं म्हटलं, ‘‘सायोनारा…’’

घरी जाऊन बॉक्स उघडला तेव्हा कीकोचा एक सुंदर मोठा फोटो फ्रेम केलेला मिळाला. त्या खाली लिहिलं होतं, ‘हिरोशिमाचा एक अंश.’

चकित होऊन दोघंही बघत होती. शिवम अन किको जुळी भावंडं दिसत होती. फक्त किकोचा रंग जपानी गोरा होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें