* गरिमा पंकज

नुकतेच मेट्रो आणि अन्य शहरांमध्ये राहणाऱ्या १,२०० महिलांचे मॉम्सप्रेसो नावाच्या कंपनीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात असे समोर आले की, ७० टक्के माता त्यांच्या जीवनात आनंदी नाहीत. ५९ टक्के माता वैवाहिक जीवनात सुखी नाहीत तर ७३ टक्के मातांना असे वाटते की, मुलांच्या नजरेत त्या स्वत:ला चांगली आई म्हणून सिद्ध करू शकत नाहीत.

जरा विचार करा, मातृत्वाचा प्रवास कितीतरी अवघड असतो. ९ महिन्यांपर्यंत अधूनमधून पोटात प्रचंड वेदना, छातीत जळजळ, उलटया, पाठदुखी, कफ, व्हेरिकोस व्हेन्ससारखे आजार आणि त्यानंतर प्रदीर्घ काळ सहन कराव्या लागणाऱ्या प्रसूती कळा. एवढया सगळया त्रासानंतर एका महिलेला मातृत्वाचा आनंद मिळतो. ती बाळाला जीवन आणि पतीला पिता बनण्याचे सुख देते.

आई झाल्यावरही ती मुलासोबत रात्रभर जागते. काहीही न खातापिता सतत काम करत असते. बाळाला दूध पाजते, त्याचे लंगोट बदलते, त्याला आंघोळ घालते, पण २४ तास काम करणाऱ्या आईच्या सुखाचा विचार घरातील किती लोक करतात?

का निराश आहेत माता?

खरंतर २०-२५ वर्षांपूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबात मुलांकडे लक्ष द्यायला कोणीतरी असायचेच. आजच्या तांत्रिक विकासाच्या आणि वाढत्या स्पर्धेच्या या युगात कुटुंब छोटी झाली आहेत. याचा अर्थ आईपुढील आव्हाने आणि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.

घरात वडील भलेही जास्त शिकलेले असले, आई कामाला जात असेल तरीही मुलाला शिकवण्याची, त्याचा गृहपाठ करून घेण्याची जबाबदारी आईचीच असते. मुलाच्या काळजीमुळे आई सतत तणावाखाली वावरत असते. जसे की, मुलाकडून होत असलेला गॅजेट्स आणि इंटरनेटचा जास्त वापर, त्याचे खाण्या-पिण्याचे नखरे, त्याला शिस्त लावणे, त्याच्या परीक्षा यामुळे आई सतत चिंतेत असते.

पेप्सिकोच्या सीईओ इंदिरा नुयी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘माझ्या लग्नाला ३४ वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. मला २ मुली आहेत. दर दिवशी सकाळी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की, तुम्हाला आज पत्नीची जबाबदारी पार पाडायला महत्त्व द्यायचे आहे की आईची जबाबदारी पार पाडायला प्राधान्य द्यायचे आहे. प्रत्यक्षात अनेकदा तुम्हाला या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कितीतरी निर्णय संयमाने घ्यावे लागतात. तरीही आज जर तुम्ही माझ्या मुलींना माझ्याबद्दल विचारले तर मला वाटत नाही की, त्या मी एक उत्तम आई आहे असे सांगतील.’’

चला माहीत करून घेऊया की, आईच्या आनंदाच्या मार्गात कोणकोणते अडथळे असतात :

पती आणि मुलांचे सहकार्य : सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षभरात २७ टक्के मातांचे त्यांच्या कुटुंबाने कुठल्याच प्रकारचे कौतुक केले नाही. जर एखादी आई आपल्या मुलांसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत सतत वेगवेगळी कामे करत असेल, सतत कष्ट करत असेल तर आपल्या पत्नीसोबत ठामपणे उभे राहण्याची जबाबदारी पतीचे नाही का? आईला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा, तिला प्रेम आणि आदर द्यायला हवा, असा विचार तिच्या मुलांनी करायला नको का?

स्वत:साठी वेळ : पती, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांना कसे आनंदी ठेवावे, याची चिंता महिलांना सतत सतावत असते. स्वत:च्या आनंदाकडे मात्र त्या नेहमीच दुर्लक्ष करतात.

कुठलेही नाते तेव्हाच मजबूत होते जेव्हा त्याचा पाया भक्कम असतो. महिला जेव्हा एखाद्या कुटुंबाचा घटक बनते तेव्हा त्यासाठी तिला कितीतरी तडजोड करावी लागते. पती आणि सासू-सासऱ्यांनी याचा विचार करायला हवा की, अतिशय कष्टाने घराला सुखी करणाऱ्या आईच्या अस्तित्वाला महत्त्व द्यायलाच हवे. तिच्या जीवनाशी संबंधित निर्णय तिलाच घ्यायला द्यायला हवेत. तिच्या सुखाची, आनंदाची काळजी घ्यायला हवी.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...