कथा * अर्चना पाटील

क्षितिज आज खूप आनंदात होता. विदिशाला भेटण्यासाठी तो पुण्यात आलेला होता. दोघेही मुलींच्या होस्टेलपासून जवळच असलेल्या एका आइसक्रीमच्या दुकानात भेटले.

‘‘मला उशीर झाला का?’’

‘‘नाही, मीच लवकर आलो होतो.’’

‘‘मी तुम्हाला एक विचारू का?’’

‘‘जे काही विचारायचे आहे, सगळेच विचारून टाक. लग्नानंतर गोंधळ नको.’’

‘‘तुम्ही एमएससी केमिस्ट्री, मग गावाकडे का राहता? पुण्यात येऊन नोकरी का करत नाही? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करत नाही?’’

‘‘शंभर एकर शेती आहे आपली? शिवाय आता मी देशमुखांचा एकटाच वारसदार. माझ्याशिवाय ती शेती कोणी पाहणार नाही. नोकरीतून जो पगार मिळेल त्यापेक्षा जास्तच उत्पन्न घेतो की मी शेतीतून. मग काय गरज नोकरीची?’’

क्षितिजच्या उत्तरातून विदिशाच्या लक्षात आलं की हा मुलगा कधीही त्याचे गाव सोडून शहरात येणार नाही.

‘‘तुमच्या आईचा स्वभाव कसा आहे?’’

क्षितिज खदखदून हसायलाच लागला.

‘‘एकदम सासूवरच आली की तू. माझ्या आईनेच पसंत केली आहे तुला. पण खरं सांगू का तूझा फोटो पाहिला आणि मी प्रेमातच पडलो तुझ्या. ग्रामीण भागातील असूनही पुण्यात बीएससी कॉम्प्युटर शिकते तू, इतकं भारी इंग्रजी बोलते तू. तुझं बोलणं, हसणं सगळंच आवडतं मला. कधी एकदा तू लग्न करून माझ्या आयुष्यात येशील असं झालं आहे मला.’’

विदिशाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तिने लाजून मान खाली घातली. लग्नाचा दिवस येईपर्यंत क्षितिज आणि विदिशाने एकमेकांच्या आवडीनिवडी, इच्छा, हनीमुन स्पॉट सर्व गोष्टींवर गप्पा मारल्या होत्या. एक मार्च लग्नाचा दिवस उजाडला. नवरदेवाची वरात पारावरून येऊन मंडपात उभी राहिली. पण नवरदेवाला ओवाळण्यासाठी वधुपक्षाकडून कोणीही पुढे येईना. कारण नवरी एक चिठ्ठी लिहून पळून गेली होती.

‘‘तात्या, मी खूप मोठी चूक करते आहे. पण लग्न करून आयुष्यभर अॅडजस्ट करायला माझं मन तयार होत नाहीए. आईसारखं केवळ चुल आणि मुल करायला नाही जमणार हो मला. तुम्ही शोधलेल्या स्थळात काहीच कमतरता नाही. त्यामुळे मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी माझ्या या विवाहबंधनातून सुटका नाही. म्हणूनच तुम्हाला न सांगता मी हे घर कायमचे सोडून जाते आहे.’’

‘‘शिकवा अजून शिकवा पोरीला,’’ तात्या स्वत:च्या बायकोवर ओरडतही होते आणि रडतही होते. वरपक्षाच्या घरीही स्मशानशांतता होती. देशमुखांच्या छातीत दुखायला लागले होते.सगळया गावासमोर नाचक्की झालेली होती. पण तरीही आपल्या कुटुंबाकडे पाहून क्षितिजने स्वत:ला सावरले.

विदिशाने पुण्यात येऊन होस्टेल सोडले. वेदिका नावाच्या मुलीसोबत एका फ्लॅटमध्ये ती भाडयाने राहू लागली. एका कंपनीत तिला नोकरी मिळाली होती. वेदिका खुप दारू प्यायची, पाटर्यांना जायची. पण पर्याय नव्हता म्हणून विदिशा तिच्यासोबत राहत होती. चार वर्षे अशीच गेली. एका रात्री वेदिका दोन लाख कॅश असलेली बॅग घेऊन आली. विदिशा काही विचारणार तेवढयात तिच्यामागे एक रूमाल चेहऱ्यावर बांधलेला तरुण फ्लॅटच्या आत शिरला.

‘‘बॅग इकडे आण नाहीतर फुकट मरशील.’’

‘‘बॅग मिळणार नाही. तु आधी बाहेर हो.’’

त्या तरूणाने पुढच्याच क्षणी वेदिकाच्या पोटात चाकू खुपसला आणि बॅग घेऊन फरार झाला. विदिशाला काहीच समजत नव्हते. फ्लॅट संस्कृतीत तिच्यासाठी कोणी दरवाजाही उघडणार नव्हते. तिने पटकन चाकू वेदिकाच्या पोटातून बाहेर काढला आणि रिक्षा घेण्यासाठी खाली गेली. एका रिक्षावाल्याला सोबत घेऊन ती फ्लॅटमध्ये पुन्हा आली तर रिक्षावाला ओरडतच खाली पळाला. विदिशा वेदिकाजवळ गेली तर तिचा श्वास बंद झालेला होता. तेवढयात वॉचमन फ्लॅटमध्ये आला. पोलीस स्टेशनमध्ये फोन करण्यात आला. विदिशा आता निराश झाली होती. वेदिका प्रकरण आपल्याला खूप महाग पडणार हे तिला समजून चुकलं होतं. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. पोलीस संपूर्ण फ्लॅटमध्ये फिरत होते. वेदिकाची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी विदिशाला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सकाळी नऊ वाजताच विदिशा पोलीस स्टेशनला जाऊन बसली. कधी हे प्रकरण संपेल असं झालं होतं तिला.

‘‘साहेब आले नाहीत अजून. दहा वाजता येतील. केबिनमध्ये जाऊन बसा,’’ पोलिस हवालदार म्हणाला.

केबिनमध्ये शिरताच टेबलवरील क्षितिज देशमुख ‘पाटी’ वाचली आणि विदिशाच्या डोळयांतून टपटप पाणी यायला लागले. तेवढयात क्षितिज दाखल झाला. तो येताच विदिशा पटकन उभी राहिली.

‘‘वेदिका मर्डर केस. चाकूवर तुझ्याच बोटाचे ठसे आहेत. हॉलमध्येही सगळीकडे फक्त तुझ्याच हाताचे ठसे आहेत. फक्त तू खुन का केला? खुनामागचे कारण समजत नाहीए .ते तुच सांगून टाक आणि प्रकरण मिटव.’’

‘‘मी खून केलेला नाहीए.’’

‘‘पण पुरावे तर तेच सांगत आहेत.’’

‘‘काल काय झालं होतं ते मी लेखी जबाबात सांगितलं आहे.’’

‘‘पण ते सगळं खोटं आहे. तू तुरुंगात नक्कीच जाणार. आजपर्यंत केलेल्या सगळयाच गुन्ह्यांची मी शिक्षा देणार आहे, मिस विदिशा.’’

‘‘हे बघा…’’

‘‘चुप, बिलकूल चुप. कदम, गाडी काढा. आमदारांनी बोलवलंय आपल्याला. मॅडम, रोज सकाळी यायचं इथे चौकशीला. समजलंना.’’

विदिशाला दिवसभर काय करावं काहीच समजत नव्हतं. संध्याकाळी ती पुन्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर क्षितिजची वाट पाहू लागली. रात्री नऊ वाजता क्षितिज बाहेर आला. तो बाईकला किक मारणार तेवढयात विदिशा त्याच्यासमोर आली.

‘‘मला बोलायचं आहे तुमच्याशी.’’

‘‘बोल.’’

‘‘मी खूप चुकीचे वागले होते चार वर्षांपूर्वी. मला माफ करा. पण मी हा खून केलेला नाही. प्लीज, मला यातून सोडवा.’’

‘‘लॉजवर चलते का, हनीमुनसाठी महाबळेश्वरला जाऊ शकलो नाही तर लॉजवरच जाऊन येऊ. तुझे सगळे गुन्हे माफ. बसते का मग बाइकवर.’’

‘‘क्षितिज…’’ काय बोलावे तेच समजत नव्हतं विदिशाला आणि पुढच्याच क्षणी क्षितिज निघून गेला.

दुसऱ्या दिवशी विदिशा पुन्हा केबिनमध्ये येऊन बसली.

‘‘काय काम करतेस तू?’’

‘‘कंपनीत आहे.’’

‘‘लग्न झालं का बाकी आहे तुझं? ओह सॉरी, असलम बॉयफ्रेंड आहे तुझा. लग्न न करताही सगळया गोष्टी करतात आजचे तरूण आणि तरूणी. नाही का?’’

‘‘तुम्ही मला चुकीचं समजत आहात. असलम माझा नाही वेदिकाचा मित्र होता.’’

‘‘दोन मुलींचा एकच मित्र असू शकतो ना?’’

‘‘मी अजून असलम नावाच्या व्यक्तिचं तोंडदेखील पाहिलेलं नाही.’’

‘‘कमाल आहे बुवा. तू असलमला पाहिलं नाही. वॉचमनने रूमालाने तोंड झाकलेला तरूण पाहिलेला नाही. पैशांची बॅग तर अजून तुझ्याशिवाय कोणीच पाहिलेली नाही. बाकीचं उद्या पाहू. निघ.’’

रोज सकाळी पोलीस स्टेशनला येणे. तीन चार वाजता केबिनमध्ये जाणे. अर्धा तास क्षितिजला सामोरे जाणे असे चक्र सुरू होते. क्षितिज विदिशाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसे. कधी लेडी कॉन्स्टेबलसमोर तर कधी स्टाफसमोर. दोन महिन्यापासून हे चक्र सुरू होतं. विदिशाची नोकरी गेलेली होती. गावाकडे विदिशाची चिंता करून करून आई दवाखान्यात अॅडमिट झालेली होती. सतत चोवीस तास एक माणूस सतत तिच्यामागे फिरत होता. नेहमीप्रमाणेच आजही चौकशी चालू झाली.

‘‘रोज रोज चकरा मारत आहात. त्यापेक्षा गुन्हा कबूल करा ना.’’

विदिशा काहीच बोलत नव्हती. ती फक्त खाली मान घालून बसली होती.

‘‘जी मुलगी मायबापाला झाली नाही ती मैत्रिणीला काय होणार? असलम कोण? बॉयफ्रेंड आहे? कालच पकडलं आहे मी त्याला. दोन लाख कॅश असलेली बॅग सापडली आहे त्याच्याकडे,’’ क्षितिज विदिशाच्या खुर्चीशेजारीच टेबलवर बसून बोलू लागला.

पण तरीही विदिशा काहीच बोलत नव्हती. आपल्याला तुरुंगात जावंच लागणार आहे. आपण आपल्या आईवडिलांना आणि देशमुख कुटुंबीयांना जो त्रास दिला, त्याचीच शिक्षा आपल्याला मिळणार आहे. हे तिला समजून चुकलं होतं.

तेवढयात तात्या केबिनमध्ये दाखल झाले. तात्यांनी केबिनमध्ये शिरताच दोन्ही हात जोडून क्षितिजच्या पायावर डोके ठेवले.

‘‘साहेब, माझी बायको खूप सिरीयस आहे. आमच्या मुलीकडून चूक झाली त्यासाठी मी तुमची माफी मागतो. माझ्या बायकोसाठी माझ्या मुलीला खुनाच्या या केसमधून सोडवा ही नम्र विनंती करतो तुम्हाला.’’

‘‘अहो तात्या, सगळं काही ठीक होईल. तुम्ही घरी जा आता.’’

विदिशा पाठमोरी बसूनच सगळं ऐकत होती. तात्यांच्या नजरेला नजर देण्याची हिंमतच नव्हती तिच्याकडे. पण तात्या बाहेर पडताच टेबलवर डोकं ठेवून धाय मोकलून ती रडू लागली.

‘‘तू बाहेर निघ आता, संध्याकाळी बोलू.’’

‘‘का, संध्याकाळी का? आताच बोला. मी खून केला आहे ना. असंच स्टेटमेंट पाहिजे आहे ना तुम्हाला. मी तयार आहे गुन्हा कबूल करायला. सहन नाही होत मला आता. बंद करा हा खेळ. तुमच्यासोबत लग्न म्हणजे केवळ देशमुख वाडयातील शोभेची बाहूली बनणं होते. स्वत:ची निर्णयक्षमता गहाण ठेऊन नवऱ्याच्या मागे चालणं पटत नव्हतं मला. माझं शिक्षण, माझी मेहनत वाया जाणार होती. तुमच्या घरी आणि तात्यांना सांगून काही उपयोग नव्हता. मग काय करायला हवं होतं मी?’’ विदिशा रडतही होती आणि संतापून बोलतही होती.

‘‘मला सांगायला हवं होतं ना, मी बोललो असतो तात्यांशी.’’

‘‘तुमचं ऐकून तात्यांनी मला पुण्यात पाठवलं असतं का? अगोदरच त्यांचा मुलींच्या शिक्षणाला विरोध होता. आईने भांडून भांडून मला पुण्यात शिकायला पाठवलं. शेवटच्या क्षणी असह्य झालं आणि मंडप सोडून पळाले मी.’’

‘‘आणि माझं काय? माझ्यासोबत चार महिने फिरलीस, माझ्या भावनांशी खेळलीस, त्याचं काय? माझ्या आईवडिलांचा यात काय दोष होता.’’

‘‘मला वाटत होतं तुम्हाला फोन करावा पण हिंमत होत नव्हती.’’

‘‘तुला जे करायचं होतं ते तू केलंस, आता मला जे करायचं आहे ते मी करेन. निघ बाहेर.’’

विदिशा हताश होऊन पुन्हा बाहेरच्या बाकडयावर येऊन बसली, पण डोळयातील अश्रू थांबत नव्हते.

‘‘सर, ती मुलगी खुपच रडते आहे बाहेर. तिला घरी पाठवू का?’’

क्षितिज काहीच बोलला नाही. शेवटी कदमने स्वत:च विदिशाला घरी सोडून दिले. विदिशा गावाकडे गेली. आईला भेटली. दोघीही गळयात गळे घालून रडू लागल्या.

‘‘माझी पोरगी, कशात अडकलीस? तुझ्याकडून खुन होणे शक्यच नाही. कशी सुटशील तु आता यातून?’’

‘‘मी तुम्हाला सगळयांना छळलंना म्हणून मला ही शिक्षा मिळाली आहे आई. म्हणतात ना पेरतो तेच उगवतं.’’

‘‘काही होणार नाही आहे तुमच्या पोरीला. केस सॉल्व्ह झाली आहे मावशी. असलम नावाच्या माणसाने गुन्हा कबूल केला आहे. वेदिकाचा प्रियकर होता तो. दोघांचाही पैशावरून वाद होता आणि त्यातच हा खुन झाला. तुमची मुलगी निर्दोष आहे. आता लवकर बऱ्या व्हा आणि दवाखाना सोडा,’’ क्षितिज पटपट बोलून निघून गेला. विदिशाचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती क्षितिजच्या मागे पळू लागली.

‘‘सर, सर मी तुमचे हे उपकार कसे फेडू?’’

‘‘लग्न कर माझ्याशी,’’

‘‘काय?’’

‘‘जस्ट जोकिंग. मुलगा आहे मला आता एक वर्षाचा, मिस विदिशा.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...