कथा * मीना गुप्ते

किती तरी दिवसांपासून गाजत असलेलं प्रसिद्ध उद्योगपती गौतम खन्ना आणि विश्वसुंदरी यशोधरा यांचं लग्न शेवटी आज झालं होतं. ‘अशी देखणी जोडी आजपर्यंत बघितलीच नव्हती’ अशी प्रतिक्रिया लग्नाला येणारा प्रत्येकजण देत होता. नवरानवरी लोकांना भेटत होती, आशिर्वाद, शुभेच्छांचा स्वीकार करत होती. त्यावेळीही त्यांच्या डोळ्यांतलं परस्परांविषयीचं प्रेम लपत नव्हतं.

गौतम ब्युटी कॉन्टेस्टमध्ये जज म्हणून गेला होता, त्यावेळी मिस वर्ल्ड कॉन्टेस्टमधून निवडली गेलेली ब्रेन एन्ड ब्युटी यशोधराच्या प्रेमातच पडला. हिला विश्वसुंदरीचा मुकुट मिळायलाच हवा अशी खूणगाठ त्यानं मनाशी बांधली.

विश्वसुंदरीच्या तयारीसाठी यशोधराला गौतमनं सर्व प्रकारची मदत केली. तिच्या प्रशिक्षणाच्या काळात तो तिला सतत प्रोत्साहन देत होता. यशोधराची मेहनत आणि गौतमचे प्रयास यामुळेच मुख्य स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक सुंदऱ्यांमधून यशोधरेची विश्वसुंदरी म्हणून निवड झाली. तिच्या माथ्यावर तो झकाळणारा क्राउन बघून गौतमच्या प्रयत्नांचं सार्थक झालं. त्यानंतर दोघांमधली मैत्री प्रेमात बदलली अन् आज त्यांचं लग्न लागलं होतं.

वरवधू दोघांच्याही घरातून या लग्नाला संमती होती. दोघांच्याही आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान अन् आनंद होता. दोन आठवड्यांचा हनिमून आटोपून गौतम अन् यशोधरा परत आली होती.

नेहमीचं आयुष्य सुरू झालं. गौतम त्याच्या धंद्याच्या व्यापात गुंतला. विश्वसुंदरी झाल्यामुळे यशोधरेलाही बरीच कॉन्ट्रॅक्ट्स पूर्ण करायची होती. कुठल्या वा कुठल्या कार्यक्रमात चीफगेस्ट म्हणून बोलावलेलं असायचं. बरेचदा ती सासूसासऱ्यांना बरोबर न्यायाची. कधी तरी गौतमही तिच्यासोबत असायचा. तिला परदेशातही बोलावणी असायची. एकदा स्वित्झलंडमध्ये असताना तिच्या चाहत्यांनी तिला गराडा घातला. कसंबसं पोलिसांच्या मदतीनं गौतमनं तिला या गर्दीतून बाहेर काढून हॉटेलपर्यंत नेलं होतं. राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय बाजारातील सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींसाठीही तिला बोलावणी येत. फिल्म आणि मॉडेलिंगसाठीही विचारणा सुरूच होती. मिडियावाले सतत घरी यायचे. आपल्या या यशामुळे यशोधरा तर हवेतच तरंगत होती.

सुरूवातीला गौतमनं तिला सहकार्यही खूप केलं. नंतर त्याला त्या कार्यक्रमांचा कंटाळा यायला लागला. कारण तो जरी तिचा नवरा असला तरी लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू यशोधराच असायची. काहीवेळा तर गर्दीत यशोधराला प्रोटेक्ट करताना धक्काबुक्की व्हायची. तरीही तो खुश होता. त्याला यशोधराविषयी तक्रार नव्हती.

सासरी माहेरी या सर्व गोष्टींचं सर्वांनी कौतुकच केलं. लग्नाला सात आठ महिने झाले. पण यशोधराचे कार्यक्रम संपेनात. आता सासूसासरे थोडे वैतागले. गौतमनंही तिला प्रेमानं समजावलं. वैवाहिक जीवनाच्या मर्यादा समजावल्या, पण यशोधराचं यश तिच्या डोक्यात गेलं होतं. आता तिला उन्मुक्त आयुष्य जगायचं होतं. कुठलंच बंधन नको होतं.

पण तेवढ्यात दोन्हीकडच्या कुटुंबातली मंडळी आनंदी होतील अशी सुवार्ता समजली. यशोधराला दिवस गेले होते. खरं तर हे मातृत्त्व यशोधरेला यावेळी मुळीच नको होतं. पण तसं बोलून दाखवण्याचं धाडस तिला झालं नाही. तिनं गुपचुप तिच्या लेडी डॉक्टरशी बोलून बघितलं. पण डॉ.नं एबॉर्शनला स्पष्ट नकार दिला. दोन्ही कुटुंबात आनंदाला उधाण आलं होतं. यशोधराला कुठं ठेवू, कुठं नको असं सासूला अन् आईला झालं होतं.

यशोधराचा आयुष जेमतेम दोन वर्षांचा होतोय तोवर लहानगी आशी ही आली. या दोन बाळांच्या येण्यानं तिचं आयुष्य एकदमच बदललं. तिच्यासारख्या उन्मुक्त अन् महत्त्वांकाक्षी स्त्रीला हे सगळं फारच अवघड होतं.

मुलं थोडी मोठी झाली अन् त्यांच्या जबाबदारीतून ती बऱ्यापैकी मोकळी झाल्यावर मात्र ती सुसाट वेगानं आपल्या प्रसिद्धीच्या आयुष्याकडे निघाली. ते झगझगीत यशाचं जग तिला भुरळ घालत होतं. त्या नादात मुलांना, नवऱ्याला, सासरच्या माणसांनाही आपली गरज आहे हे तिला लक्षात येत नव्हतं. गौतमनं प्रेमानं, समजूतीनं, प्रसंगी नाराजीनंही तिला सावध करायचा प्रयत्न केला, पण आता यशोधरा मागे फिरणार नव्हती.

फॅशनचं जग तसं मायावी. त्यातून आंतरराष्ट्रीय बाजार तर अधिकच भडक. यशोधरानं या जगात पुन्हा पाऊल टाकलंय हे कळताच प्रसाधनं तयार करणाऱ्या कंपनीनं तिच्याशी संपर्क साधला. यशोधराशी त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टसाठी कॉन्ट्रक्ट केलं. एक रूपवती पत्नी, घरंदाज सून अन् यशस्वी आई म्हणून ती जाहिरातींसाठी शूट करायची. दिवसेंदिवस ते जरा जास्तच बोल्ड होऊ लागलं होतं. यशोधरेला सगळ्या जगाला हे दाखवून द्यायचं होतं की लग्न झालं, दोन मुलंही झाली तरीही ती अजून तेवढीच सुंदर आहे. तिचं कमनीय शरीर कुठंही बोजड झालेलं नाही. बाजार अन् तिथली माणसं जेव्हा पैसे देतात तेव्हा ते त्या पैशांची पुरेपूर वसुलीही करून घेतात, हे मात्र त्यामानानं वृत्तीनं साध्या असलेल्या यशोधरेच्या लक्षात आलं नाही. प्रसाधनं कंपन्यांनी त्यांचा फायदा बघत यशोधरेच्या बोल्ड फोटोशूटला खूपच प्रसिद्धी दिली.

बिझनेसच्या कामानं न्यूयॅर्कला गेलेल्या गौतमला तिथल्या मॉलमध्ये लावलेल्या यशोधरेच्या मोठ्या जाहिरातींच्या पोस्टर्स दिसल्या. थोड्या भडक उत्तान पोझोस, खटकावी अशी वेशभूषा…गौतमला हा प्रकार नवा होता. सगळीकडे आव्हान देणारी, उत्तेजित करणारी यशोधरेचीच छबी…हे फोटोशूट करणार आहे असंही तिने गौतमला सांगितलं नव्हतं, झालेलं फोटोशूट दाखवलंही नव्हतं. गौतमच्या डोक्यात तिडिक उठली. त्यानं यशोधरेला फोन लावला, पण तिनं फोन उचलला नाही. कदाचित त्यावेळी एखाद्या कार्यक्रमात बिझी असेल असा विचार करून गौतम पुन्हा:पुन्हा तिला कॉल करत सुटला, पण अगणित मिस्ड कॉल बघूनही यशोधरेनं तो काय म्हणतोय, कशासाठी इतके फोन करतोय हे जाणून घ्यायची तसदी घेतली नाही. त्यानंतर गौतमनं तिला फोन केला नाही.

परतीच्या प्रवासात लंडनला थांबला असताना तिथंही सगळीकडे यशोधराची तिच पोस्टर्स बघून त्याचा राग अनावर झाला. तिच्या मादक सौंदर्याचा गैरवापर केलेली ती पोस्टर्स फाडून टाकावीत असं त्याला वाटलं. अर्थात् परदेशी बाजारात बुरखा घालून किंवा घुंगट घेऊन फोटोशूट होणार नाहीत हे त्यालाही कळत होतं. पण असं फोटोशूट त्याच्या कल्पनेच्या पलिकडचं होतं. ज्या सहज मोकळेपणानं तिनं पोझोस दिल्या होत्या, तसं तिचं रूप तर त्यानं त्यांच्या एकांतात, बेडरूममध्येही बघितलं नव्हतं. अर्थात् हे सगळं कॉन्टॅ्रक्टमध्ये ठरलेलंच होतं. परदेश प्रवासातच हे सगळं घडलं असणार पण तरीही, प्रतिष्ठित घराण्यातल्या सुनेनं, दोन मुलांच्या आईनं हे करावं हे त्याला खटकलं. पैसा-अडका हवा तेवढा होता. पण घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. त्याचे नातलग, मित्र, त्याचे वडिलही कामानिमित्तानं सतत परदेशात जात, येत असत. त्यांनी हे सगळं बघितलं तर? त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील? केवळ त्या कल्पनेनंही एवढ्या थंडीत त्याला घाम फुटला. त्यानं लंडनहून पुन्हा तिला फोन लावला. यावेळी तिनं फोन घेतला. त्यानं तिच्यावर भरपूर तोंडसुख घेतलं. तिनं त्याला ती निर्दोष आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण तो काहीच ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हता. सगळी कामं रहित करून तो सरळ भारतात परतला.

गौतमनं तिच्यासाठी काय केलं नव्हतं. तो नसता तर विश्वसुंदरीचा क्राऊन तिच्या माथ्यावर कदाचित झळकलाच नसता पण यशोधरा ते सर्व विसरली होती. रागानं फणफणतच तो घरी पोहोचला. त्यावेळी यशोधरा मुलांना घेऊन कुठंतरी बाहेर गेली होती. गौतमच्या मते तिनं त्यावेळी घरी राहणं अपेक्षित होतं. सासूलाही तिनं काहीच सांगितलं नव्हतं आणि तिच्या आईलाही यातलं काहीच माहीत नव्हतं. राहिलासाहिला फोनही स्विच्ड ऑफ येत होता.

दोन दिवसांनी यशोधरा परतली अन् त्यांच्या दोघांच्या भांडणाचा जो काही बॉम्बस्फोट झाला, त्यानं सगळंच उद्ध्वस्त झालं.

‘‘आता माझा वकील कोर्टातच बघेल तुम्हाला,’’ संतापून यशोधरेनं गौतमला धमकीच दिली. दोन्ही मुलांना घेऊन त्याक्षणी तिनं घर सोडलं. दुसऱ्याच दिवशी तिनं आपलं अन् मुलांचं गरजेचं सामानही मागवून घेतलं. नवराबायकोच्या भांडणाची बातमी वणव्याप्रमाणे सगळीकडे पसरली. गौतमच्या एवढ्या प्रतिष्ठित संपन्न घराण्याच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. सगळीकडे तिच चर्चा. मिडिया तिखटमीठ लावून बातम्या पुरवत होता. लोक पदरचे मसाले घालून विषय चघळत होते. गौतमच्या भाग्याचा हेवा करणारे खूपच सुखावले होते. अफवांना ऊत आला होता. गौतमनं यशोधरेला घटस्फोट दिला असता तर गोष्ट वेगळी होती. इथं पत्नीनं पतीला घटस्फोट दिला होता. कोर्टाची नोटिस बघून गौतम भांबावला. गौतमची आई स्वत: जाऊन यशोधरेला भेटली…तिची समजूत घातली, पण यशोधरा ऐकून घ्यायलाच तयार नव्हती.

पहिल्या सुनावणीच्या वेळी स्वत: न्यायाधिशांनी गौतम आणि यशोधरेला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतलं. दोघांनाही समजावलं अन् खटला काढून घ्या म्हणून सुचवलं. दोघांच्या प्रतिष्ठिचा प्रश्न असा. चव्हाट्यावर येऊ नये अन् मुलं लहान आहेत त्यांच्यावर या घटस्फोटाचा परिणाम फार वाईट होईल हेही सांगितलं.

गौतम तर शांत होता, पण यशोधरा मात्र संतापून म्हणाली, ‘‘नाही जजसाहेब, माझं म्हणणं यांनी ऐकून घेतलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्यावर हात उगारला…मी यांच्याबरोबर राहू शकत नाही.’’

‘‘ठीक आहे, तर मग तुम्ही दोघं आपसात हे भांडण मिटवा. मुलांवर दोघांचाही सारखाच हक्क आहे. त्यांची कस्टडी दोघांच्या सहमतीनं ठरवा. पण प्रकरण चिघळवून मिडियाला उगीच खाद्य पुरवू नका.’’ जज म्हणाले.

त्या दिवशी कोर्टात काम झालंच नाही. तारीख पुढे ढकळली. मिडियावाले तर संधीच शोधत असतात. न घडलेल्या घटनाही मसाला लावून सांगितल्या गेल्या. गौतमचं प्रेमप्रकरण होतं म्हणून यशोधरा विभक्त झाली असंही म्हटलं गेलं तर यशोधराचे इतर कुणाशी संबंध असल्यामुळे गौतमनं डायव्होर्स घेतला असंही बोललं गेलं. नित्य नव्या अफवा चारी बाजूंनी उडत होत्या.

गौतमच्या त्या आलिशान बंगल्यातलं सगळं चैतन्य नाहीसं झालं होतं. सगळीकडे मरगळ होती. घरात सगळ्यांचे चेहरे उदास आणि दु:खी होते. मुलांशिवाय गौतमला चैन पडत नव्हती. गौतम विचार करत होता, त्यानं खरंच घाई केली होती का? यशोधराचं म्हणणं ऐकून न घेताच त्यानं तिच्यावर आरोप केले होते का? यशोधरा महत्त्वाकांक्षी आहे. धाडसी आहे, मानीनी आहे. हे तर त्याला ठाऊकच होतं. त्याला तिचा अभिमानही वाटत होता. मग हे असं सगळं का व्हावं?

‘‘गौतम, जरा इकडे ये, बघ तर तुझ्या आणि यशोधराबद्दल हे टीव्हीवाले काय काय सांगताहेत. आत्तापर्यंत पेपरवालेच छळत होते आता हे टीव्हीवाले सामील आहेत. किती अभद्र अफवा उठवाव्यात? आम्हाला तर तोंड दाखवायला जागा राहिली नाही. तुझ्या बाबांनी तर घराबाहेर पडणंच बंद केलंय. ज्यांच्यासमोर उभं राहायलाही भलीभली माणसं घाबरत होती, आज त्यांच्याबद्दल कुणीही उपटसुंभ काहीही बोलतोय. आपल्या यशामुळे जळणारे तर खूपच आनंदात आहेत,’’ अनितानं, गौतमच्या आईनं म्हटलं.

गौतम त्यांच्याजवळ येऊन बसला. ‘‘आई, मलाही या सर्व गोष्टींचा त्रास होतोच आहे ना? यशोधराला घटस्फोट हवा आहे तर मी तो कुठल्याही कटकटीविना देतोय, मग ती मिडियाला, टीव्हीला अशा मुलाखती का देते आहे? कोर्टात तिच्या त्या मूर्ख वकिलानं माझ्यावर खोटे आरोप लावून माझा अपमान केलाय. त्याचा सूड मी घेणार. त्या वकिलाला अन् यशोधरेलाही मी सोडणार नाही,’’ गौतम म्हणाला.

‘‘आयुष आणि आशीच्या आठवणीनं आम्ही बेचौन आहोत. ती दोघं निरागस पोरं तुम्हा नवराबायकोच्या भांडणात उगीचच भरडली जाताहेत. तुम्ही वेगळं व्हायचा निर्णय घेतलाच आहे तर या नसत्या गोष्टींना कशाला एवढं महत्त्व देताय? मुलांच्या कस्टडीचा प्रश्न आहे तर मुलांवर सोपवा, त्यांना कुठं राहायचं ते मुलांनाच ठरवू देत. कुटुंब विस्कटतं तेव्हा मुलांनाच सगळ्यात जास्त त्रास सोसावा लागतो. यशोधराही इतक्या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं. ती महतत्वाकांक्षी आहे हे तर ठाऊक होतं, पण असं काही लग्नानंतर घडले असं आम्हालाही वाटलं नव्हतं. आपल्या कौटुंबिक मित्रांपैकी यशवंतरावांची अनन्या आम्ही तुझ्याकरता पसंत केली होती. पण तू अचानक यशोधरेशी लग्न ठरवल्यावर आम्ही काही बोललो नाही. अनन्याही तुझ्यावर जीव लावून बसली होती. तिला किती दु:ख झालं…यशोधराच्या आईचा तर घरचा अन् मोबाइल, दोन्ही फोन बंद आहेत. त्यांनी खरं तर मुलीचा संसार वाचवायला पुढाकार घ्यायला हवा होता. पण त्यांच्याकडून काहीच हालचाल होत नाहीए…ठीक आहे, जे झालं ते झालं…’’ एक उसासा सोडून त्या गप्प बसल्या.

गौतमच्या मनात आलं अनन्याचं मन दुखावल्याची ही शिक्षाच मला मिळतेय का? आईवडिलांनी यशोधरेला सून म्हणून स्वीकारली तरी त्यांच्या भावनाही त्यावेळी दुखावल्या गेल्याच होत्या ना?

गौतम काहीच बोलला नाही, तेव्हा अनिता पुढे म्हणाल्या, ‘‘आता उद्या कोर्टात काय तो निर्णय घेऊन टाका. ती काय जे मागते आहे ते देऊन हे प्रकरण कायमचं मिटवा. तिलाही सांग की यापुढे कुठेही तुमची दोघांची नावं मिडियापुढे येता कामा नयेत. झाली तेवढी शोभा खूप झाली. आता हे सगळं सहन होत नाही.’’ बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

असेच उदासवाणे दिवस उगवत होते, मावळत होते. घरातले, नातलग, मित्र, परिचित कुणाशीच बोलायची गौतमला इच्छा नव्हती. कुणीही भेटू नये असं वाटत होतं. एकांत, एकटेपणा हवा म्हणून कुणालाही न सांगता तो थेट गोव्याला पोहोचला. तिथं समुद्रकाठी बसून तो आत्मचिंतन करत होता. मनात नुसंत वादळ घोंघावत होतं. या वादळानंच त्यांचं सुखी, संपन्न आयुष्य पार उद्ध्वस्त करून टाकलं होतं.

बाहेर समुद्राला भरती आली होती. त्याच्या मनातही विचारांचा कल्लोळ होता. त्यानं यशोधरेवर अन्याय केलाय का? केवळ मनातल्या संशयामुळे तो तिला नाही ते बोलला. कदाचित यशोधरेला अंधारात ठेवून त्या जाहिरातदारांनी तिचे ते उत्तान फोटो छापले असतील? हल्ली तर फोटोग्राफीत काहीही ट्रिक्स करता येतात. ती काय म्हणतेय ते ऐकून घेतल्यावर निर्णय घेता आला असता. तिला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न देताच त्यानं चक्क तिच्यावर हात उगारला…त्याच्यासारख्या सुसंस्कृत माणसानं असं वागावं? यशोधरेसारखी यशस्वी, मानिनी हे सहन कसं करणार?

केवळ पत्नीवरचा अविश्वास अन् स्वत:च्या मनातला संशय यामुळेच त्याच्या सुखी संसाराची राखरांगोळी झाली होती. यशोधरा अन् मुंलाच्या आठवणीनं त्याचे डोळे भरून आले. पण धनुष्यातून बाण सुटला होता. आता काय करायचं? कुठं भेटेल यशोधरा?

सहा वर्षांपूर्वी याच बीचवर त्या दोघांनी किती छान वेळ घालवला होता. विश्वसुंदरी यशोधरा त्याच्या मिठीत होती. पूर्णपणे त्याला समर्पित होती. तिचा मान, तोरा, गर्व सगळं सगळं विसरून ती त्याला समर्पित झाली होती. गौतमला त्या आठवणीनं भरून आलं. यशोधरेला शोधायसा हवं. तिला भेटायला हवं. सगळं पूर्वीसारखं व्हायला हवं. मुलं अन् यशोधरेशिवाय राहणं अशक्य वाटलं त्याला.

तो पटकन् तिथून उठला. काही पावलं चालून होताहेत तोवर त्याला समुद्राकडे बघणारी एक आकृती दिसली. त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. समुद्रात बुडणारा मावळता सूर्य बघायला यशोधरेला फार आवडायचं. ती तेच बघत होती.

अगदी साधे कपडे, दागिने, मेकअप काहीही नाही…चेहरा कोमेजलेला…पण ती यशोधराच होती. पटकन् जाऊन तिची क्षमा मागावी म्हणून गौतम वाळूतून भराभर चालत निघाला, तेवढ्यात शंभर दीडशे पर्यटकांचा एक लोंढा आला. त्या गर्दीत तो असा काही अडकला की बाहेर पडता पडता नाकी नऊ आले.

जवळच्याच हॉटेलात जाऊन त्यानं चौकशी केली, तेव्हा ‘एवढ्यातच मॅडम इथून निघून गेल्यात’ असं त्याला सांगण्यात आलं. गौतम ताबडतोब एयरपोर्टवर आला. बिझनेस क्लासची तिकिटं संपली होती. इकॉनॉमी क्लासमध्ये जेमतेम शेवटची सीट मिळाली. खरं तर त्याला विमानांत यशोधरेला शोधायचं होतं. पण तो इतका दमला होता की बसल्या बसल्या त्याला झोप लागली. मुंबईला विमान उतरलं, तेव्हा एयर होस्टेसनं त्याला जागं केलं.

विमानातून उतरून व्याकूळ दृष्टीनं तो यशोधराला शोधत होता. शरीर अन् मन दोन्ही थकलेलं, तरीही पाय कुठेतरी ओढत नेत होते. मध्येच त्यानं टॅक्सी केली. निरूद्देश फिरत होता. मग मरीन ड्राइव्हवर टॅक्सी सोडून दिली. मरीन ड्राइव्हवर तो अन् यशोधरा वेश बदलून येऊन बसायचे. लोकांनी ओळखू नये म्हणून स्वत:च्या चेहऱ्याचा मेकअप वेगळाच करायचे.

थकून तो तिथल्या दगडांवर जाऊन बसला. एव्हाना सूर्य मावळला होता. पण पौर्णिमेचा चंद्र आकाशात सुंदर दिसत होता अन् जवळच त्याला ‘ती’ दिसली. ताडकन् उठून तो तिच्याशेजारी येऊन बसला. त्यानं हात पसरले तशी ती त्याच्या मिठीत शिरली. दोघंही नि:शब्द! फक्त मिठी दोघांची घट्ट होती.

दोघांच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहत होता. त्या महापुरात मनांतला राग, द्वेष, अहंकार, मीपणा सगळं सगळं वाहून गेलं होतं. उरली होती दोन शरीरं, दोन शुद्ध, स्वच्छ मनं.

त्यांचं हे मीलन बघून लाटाही गहिवरल्या. त्यांनी तुषार उडवून त्यांना आशिर्वाद दिले. दुरावलेले दोन जीव पुन्हा एकत्र आले. प्रेमात देवाण आणि घेवाण असतेच. एकमेकांना समजून घेणं अन् क्षमा करणंही असतंच. खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार ‘मी’ पण गळून गेल्यावरच होतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...