कथा * आरती प्रियदर्शिनी

‘‘निम्मो, संध्याकाळचे दिवे लावण्याची तयारी करून ठेव. लक्षात आहे ना, आज ५ एप्रिल आहे.’’ आत्येने आईला आठवण करून देत सांगितले.

‘‘अगं ताई, तयारी काय करायची? बाल्कनीत फक्त एक दिवा तर लावायचा आहे. शिवाय जर दिवा नसला तर मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅश लाईट किंवा बॅटरी लावू.’’

‘‘अरे, तू गप्प बस.’’ असे म्हणत आत्येने वडिलांना गप्प केले.

‘‘मोदीजींनी दिवे लावा, असे उगाचच सांगितलेले नाही. आज संध्याकाळी ५ वाजल्यानंतर प्रदोष काळ सुरू होत आहे. अशा काळात रात्री तुपाचे खूप सारे दिवे लावले तर महादेव प्रसन्न होतात. शिवाय तुपाच्या दिव्यांमुळे आजूबाजूचे सर्व किटाणूही मरून जातात. माझ्या हातात असते तर मी नक्कीच १०८ दिव्यांच्या माळेने घर उजळवून टाकले असते आणि माझी देशभक्ती दाखवून दिली असती’’, आत्येने वायफळ बडबड करीत आपले दु:ख व्यक्त केले.

दिव्याने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलेच होते, पण तेवढयात आईने तिला गप्प राहण्याची खूण केली. ती बिचारी आत्येच्या प्रश्नांची उत्तरे न देताच निमूटपणे गप्प बसली.

‘‘अहो ताई, हे घर तुमचे नाही का? तुम्ही तुम्हाला हवे तितके दिवे लावा. मी लगेचच सर्व सामान शोधून घेऊन येते,’’ आईच्या अशा समजूतदारपणाचा फायदा आत्ये वर्षानुवर्षे घेत आली आहे.

आत्ये वडिलांची मोठी बहीण असून विधवा आहे. तिला दोन मुले असून दोघांनीही वेगवेगळया शहरात स्वतंत्रपणे संसार थाटला आहे. आत्ये कधी एकाकडे तर कधी दुसऱ्या मुलाकडे जाऊन राहते. पण तिचा तापट स्वभाव सहन करीत शांतपणे राहणे केवळ आईलाच जमते. म्हणूनच ती वर्षातील ६ महिने आमच्याकडेच राहते. तसे तर यामुळे कोणाला काही विशेष त्रास होत नाही, कारण आई सर्व सांभाळून घेते. पण, आत्येच्या जुन्या, बुरसटलेल्या विचारसरणीचा मला खूपच राग येतो.

काही दिवसांपासून मला आईचाही खूप राग येत होता. आमच्या लग्नाला फक्त १५-२० दिवसच झाले होते. आत्येचे सतत घरात असणे आणि नोएडातील आमचा फ्लॅट छोटा असल्यामुळे मी आणि दिव्या मन भरून एकमेकांना भेटूही शकत नव्हतो.

कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे आमचे लग्न कसेबसे उरकले होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असल्यामुळे हनिमूनची तिकिटेही रद्द करावी लागली. आत्येला गाझियाबदला जायचे होते, परंतु, कोरोना मातेच्या भीतीने तिने आधीच स्वत:ला घरात बंद करून घेतले होते. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आणि २५ मार्चला पंतप्रधानांनी लॉकडाऊनचे आवाहन केल्यानंतर कोरोनासारख्या महामारीला हरविण्यासाठी आपण सर्व आपापल्या घरात कैद झालो. सोबतच कैद झाल्या त्या माझ्या आणि दिव्याच्या त्या कोमल, प्रेमळ भावना, ज्या लग्नापूर्वी आम्ही एकमेकांच्या डोळयात पहिल्या होत्या.

दोन खोल्यांच्या छोटयाशा फ्लॅटमधील एक खोलीत आत्या आणि तिच्या अगणित देवांचा एकाधिकार होता. आईला तर ती नेहमीच स्वत:सोबत ठेवत असे. दुसरी खोली माझी आणि दिव्याची आहे. पण, आता मी आणि वडील या खोलीत झोपतो, तर दिव्या हॉलमध्ये, कारण वडिलांना दम्याचा त्रास असल्यामुळे ते एकटे झोपू शकत नाहीत. आत्ये घरात असताना आई कधीच वडिलांसोबत झोपत नाही, कारण असे झाले तर आत्येची तिरस्काराने पाहणारी नजर जणू, तिला जाळून भस्म करून टाकेल. कदाचित हेच सर्व पाहून दिव्याही माझ्यापासून लांबच राहते, कारण आत्येची नजर सतत तिच्यावरही असते.

‘‘बाळा, जमल्यास बाजारातून मेणबत्त्या घेऊन ये,’’ आईचा आवाज ऐकताच मी माझ्या विचारचक्रातून बाहेर पडलो.

‘‘हे काय आई, तुही या सर्व गोष्टींमध्ये कशाला अडकतेस? दिवे लावून वेळ निभावून ने. सतत बाहेर जाणे चांगले नाही. नुकत्याच झालेल्या जनता कर्फ्यूवेळी टाळया, थाळया वाजवून मन भरले नाही का, ज्यामुळे आता दिवे आणि मेणबत्त्या लावणार आहात,’’ मी नाराजीच्या स्वरात आईला विचारले सोबतच बाजारात जाण्यासाठी मास्क आणि ग्लोव्हज घालू लागलो, कारण मला माहीत होते की आई ऐकणार नाही.

कसेबसे कोरोना योद्धयांच्या दंडुक्यांपासून स्वत:ला वाचवत मेणबत्त्या आणि दिवे घेऊन आलो. हे सर्व लावण्यासाठी रात्री ९ वाजण्याची वाट पाहावी लागणार होती. परंतु, माझ्या डोक्यात तर त्याआधीच प्रकाश पडला. प्रेमाने आतूर झालेल्या मनाला शांत करणारी कल्पना सुचली. लगेचच मोबाईल काढला आणि व्हॉट्सअॅपवर दिव्याला मी केलेले नियोजन समजावून सांगितले, कारण आजकाल आमच्या दोघांमध्ये केवळ व्हॉट्सअॅपवरच गप्पा होत असत. ‘‘मी जसे सांगतो तसेच कर, बाकी सर्व मी सांभाळून घेईन. पण हो, तू काही गडबड करू नकोस. तू माझी साथ दिलीस तरच ती ९ मिनिटे कायम आठवणीत राहतील.’’

‘‘बरं… मी पाहाते,’’ दिव्याच्या या उत्तरामुळे मला आंनद झाला आणि मी त्या ९ मिनिटांच्या नियोजनाबाबत विचार करू लागलो. रात्रीचे पावणे नऊ वाजताच आईने मला सांगितले की, घरातील विजेचे सर्व दिवे बंद कर. सर्वांनी बाल्कनीत या. मी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘आई, हे सर्व तुम्हीच करा. मला ऑफिसचे खूप काम आहे. त्यामुळे मी येणार नाही.’’

‘‘यांना राहू द्या आई, चला मी येते,’’ आधीच ठरल्याप्रमाणे दिव्याने आईचा हात धरून तिला खोलीतून बाहेर नेले. आई आणि आत्येसोबत तिने २१ दिवे लावण्याची तयारी केली. आत्येचे असे म्हणणे होते की, २१ दिवसांच्या लॉकडाऊनसाठी २१ दिवे उपयोगी पडतील.

‘‘आई, मी सर्व दिव्यांमध्ये तेल घातले आहे. मेणबत्ती आणि काडेपेटीही इकडेच ठेवली आहे. तुम्ही दिवे लावा, तोपर्यंत मी घरातले सर्व दिवे बंद करून येते.’’ दिव्याने पूर्वनियोजनानुसार सांगितले.

घरात येऊन ती दिवे बंद करू लागली, त्याचवेळी मी दिव्याच्या कमरेत हात घालून तिला आमच्या खोलीत ओढले. दिव्यानेही तिच्या हातांची माळ माझ्या गळयात घातली.

‘‘अरे वा, तू तर आपले नियोजन पूर्णत्वास नेलेस.’’ मी दिव्याच्या कानात पुटपुटलो.

‘‘ते तर मी करणारच होते. तुझे प्रेम आणि सहवासासाठी मीही आतूर झाले होते.’’ दिव्याच्या या मादक आवाजामुळे माझ्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या.

‘‘फक्त ९ मिनिटे आहेत आपल्याकडे…’’ दिव्या आणखी काही बोलण्याआधीच मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले. प्रेमाची जी ठिणगी आमच्या दोघांच्याही मनात धगधगत होती तिने आता आगीचे रूप धारण केले होते. वाढलेल्या आमच्या श्वासांदरम्यान ९ मिनिटांची कधी १५ मिनिटे झाली, हे समजलेच नाही.

जोरजोरात दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकून आम्ही भानावर आलो.

‘‘अरे बाळा, झोपलास का? जरा बाहेर ये… येऊन बघ दिवाळीसारखे वातावरण झाले आहे,’’ आईचा आवाज ऐकताच मी स्वत:ला सावरत दरवाजा उघडला. तोपर्यंत दिव्या बाथरूममध्ये गेली.

‘‘द… दिव्या इकडे आली नाही. ती तुमच्या सोबतच असेल,’’ मी गोंधळलेल्या स्वरात म्हणालो आणि आईचा हात पकडून बाहेर आलो.

बाहेरचे वातावरण खरोखरच दिवाळीसारखे भासत होते. तेवढयात दिव्याही स्वत:ला सावरून बाल्कनीत आली.

‘‘तू कुठे गेली होतीस दिव्या? मी आणि आई तुला कधीपासून शोधत होतो,’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘मी गच्चीत गेले होते, दिव्यांचा हा उत्सव पाहण्यासाठी,’’ दिव्याने माझ्याकडे एकटक पाहात सांगितले. त्याचवेळी मी खोडकरपणे हसून, काळोखाचा फायदा घेत आणि आत्येपासून नजर चोरत हाताने दिव्याला फ्लाईंग किस केले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...