* गरिमा पंकज

‘‘माझी एक इच्छा आहे, मला वचन दे तू ती पूर्ण करशील,’’ जान्हवीची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली होती.

‘‘मला सांग, काहीही झाले तरी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. तू फक्त सांगून तर बघ,’’ मी भावनाविवश होत म्हटले.

‘‘बरं मग मी सांगते,’’ असे म्हणत ती माझ्या जवळ आली. तिच्या डोळयांत माझ्यासाठी जणू प्रेमाचा सागर होता. मला हे जाणवत होते की, तिच्या शांत, आनंदी, निळया डोळयांत माझ्यासाठीचे प्रेम ओसंडून वाहात होते… माझ्या मिठीत गुरफटून तिने माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केला.

तो क्षण अद्वितीय होता. आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल क्षण जो काही काळ असाच आम्हा दोघांच्या मिठीत स्थिरावला होता… आणि मग ती हसत हळूवारपणे बाजूला झाली आणि म्हणाली, ‘‘फक्त हा जो क्षण होता तोच मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अनुभवायचा आहे. मला वचन दे की, मी तुला सोडून जाणार असेन त्या क्षणी तू माझ्या जवळ असशील. तुझ्या प्रेमळ मिठीतच मी माझा शेवटचा श्वास घेईन.’’

तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी भावनाविवश होत म्हणालो, ‘‘मी वचन देतो, पण अशी वेळ मी येऊच देणार नाही. मीही तुझ्यासोबत जाईन. मी एकटा राहून काय करणार?’’ असे म्हणत मी तिला माझ्या मिठीत घेतले.

तिच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेने माझे हृदय वेगाने धडधडू लागले. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. माझे जीवन माझी जान्हवी होती.

महाविद्यालयातील पहिल्या दिवशी मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो ती जान्हवी होती. तिला पहिल्यांदा पाहिले आणि बघतच राहिलो. असे म्हणतात की, हे पहिल्या नजरेतील प्रेम असते जे मी आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये पाहिले होते. मी मात्र ही गोष्ट नेहमी चेष्टेने घ्यायचो, पण जेव्हा माझ्यासोबत असे घडले तेव्हा आपण कायमचे कोणाचे तरी कसे होऊन जातो, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. जान्हवी आणि माझी मैत्री संपूर्ण महाविद्यालयात प्रसिद्ध होती. माझ्या कुटुंबीयांनीही आमच्या प्रेमाला तत्परतेने मान्यता दिली. मी वैद्यकीय शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो आणि जान्हवी दिल्लीत राहिली. काही वर्षे आम्ही एकमेकांपासून दूर होतो, पण मनाने एकमेकांशी जोडलेले होतो.

शिक्षण पूर्ण करून मी परत आलो तेव्हा लगेचच एका चांगल्या रुग्णालयात रुजू झालो. जान्हवीही एका कंपनीत काम करत होती. आणखी उशीर न करता आम्ही लग्न केले. आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो.

एके दिवशी सकाळीच जान्हवी माझ्या मिठीत शिरली आणि हळूच म्हणाली, ‘‘नवरोबा आता तयारीला लागा. लवकरच तुला घोडा व्हावे लागेल.’’

तिचे असे विचित्र बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ‘‘असे काय बोलतेस? घोडा आणि मी? का, कशासाठी?’’

‘‘तू तुझ्या बाळाची इच्छा पूर्ण करणार नाहीस का?’’ असे मला विचारताना जान्हवी लाजली. तिला काय सांगायचंय ते माझ्या लक्षात आले. मी आनंदाने उडी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिचा हात धरून म्हणालो, ‘‘आज तू मला जगातला सर्वात मोठा आनंद दिला आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.’’

आम्ही दोघे एका वेगळयाच जगात पोहोचलो होतो. आमच्यात एकमेकांबद्दलचे बोलणे कमी आणि बाळाबद्दल जास्त गप्पा होऊ लागल्या. बाळासाठी काय विकत घ्यायचे, ते कसे ठेवायचे, तो काय आणि कसा बोलेल, काय करेल, यावर आम्ही तासनतास गप्पा मारत असू. डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे फारसा वेळ नव्हता, तरीही वेळ मिळताच मी होणाऱ्या बाळासाठी काहीतरी विकत घ्यायचो. एक संपूर्ण खोली मी बाळाच्या सामानाने भरली होती. जान्हवीची पूर्ण काळजी घेणे, तिला योग्य आहार आणि औषधे देणे, तिच्या जवळ बसून भविष्याची स्वप्ने पाहणे, हे सर्व करताना मला आनंद मिळत होता.

काळ पंख लावल्याप्रमाणे वेगाने उडू लागला. जान्हवीच्या गरोदरपणाला ५ महिने उलटून गेले होते. त्या आनंदाच्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो, पण आमच्या सुखाला गालबोट लागेल, हे आम्हाला कुठे माहीत होते?

तो मार्च २०२० चा महिना होता. संपूर्ण जग कोरोनाच्या थैमानामुळे त्रासले होते. भारतातही कोरोना संसर्ग झपाटयाने पसरू लागला होता. मी जान्हवीला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉक्टर असल्याने मला बराच वेळ रुग्णालयात घालवावा लागत होता. त्यामुळे मी तिच्या आईला आमच्या घरी बोलावले, जेणेकरून माझ्या गैरहजेरीत ती जान्हवीची काळजी घेईल.

दरम्यान, एके दुपारी जान्हवीची बालपणीची मैत्रीण प्रिया तिला भेटायला आली. तिला भेटून जान्हवीला खूप आनंद झाला. जेव्हा जान्हवीने सांगितले की, प्रिया दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टनहून परतली आहे तेव्हा मी काळजीत पडलो आणि म्हणालो, ‘‘जान्हवी हे बरोबर नाही. तुला माहिती आहे का? परदेशातून परतणारे लोक या आजाराचे सर्वात मोठे वाहक असतात. जान्हवी, तू तिच्या जवळ जायला नको होतेस.’’

‘‘म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की, माझे लग्न आणि मला बाळ होणार म्हणून माझे अभिनंदन करायला आलेल्या माझ्या मैत्रिणीला मी दारातच थांबवून सांगायला हवे होते की, तू आत येऊ शकत नाहीस. मला भेटू शकत नाहीस. असे वागणे बरोबर आहे का अमन?’’

‘‘हो, बरोबरच आहे जान्हवी. तू डॉक्टरची पत्नी आहेस. तुला माहिती आहे का? आपल्या देशातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत आणि भारतात हा आजार बाहेरून पसरत आहे.’’

‘‘हो, पण ती वुहानहून नाही तर वॉशिंग्टनहून आली होती. तरीही मी तिला हात धुवायला लावले होते.’’

‘‘असेलही, पण जान्हवी माझे मन सांगतेय की, तू योग्य केले नाहीस. तू गरोदर आहेस. तुला जास्त धोका आहे. कोरोनाचा विषाणू फक्त हातावरच नाही तर कपडयांमध्येही असतात. ती एकदा तरी खोकली असेल तरीही त्यातून तुला संसर्ग होण्याचा धोका आहे. कृपा कर पण, माझ्यासाठी चुकूनही भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस,’’ मी तिला समजावले.

‘‘ठीक आहे, पुन्हा कधीच नाही.’’

तो विषय आम्ही तिथेच थांबवला. दरम्यान, रुग्णालयात रुग्ण वाढत असल्याने मला वेळेवर घरी परतणे कठीण होत होते.

त्यानंतर अचानक देशात लॉकडाऊन लागला. मी ६-७ दिवस घरी जाऊ शकलो नाही. मी जान्हवीच्या प्रकृतीची फोनवरच चौकशी करत असे. कोरोना रुग्णांसोबत राहावे लागत असल्याने मी स्वत:हून घरी जाणे टाळत होतो, कारण हा विषाणू माझ्याकडून जान्हवीपर्यंत पोहोचू नये असे मला वाटत होते.

दरम्यान, एके दिवशी फोनवरून मला जान्हवीची प्रकृती बरी नसल्याचे समजले. मी विचारले असता २-३ दिवसांपासून कोरडा खोकला आणि ताप येत असल्याचे तिने सांगितले. तापाची साधी औषधे घेऊन ती बरे होण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता.

मी खूप घाबरलो. ही सर्व लक्षणे कोरोनाची होती. मी सुन्न झालो. एकीकडे जान्हवी गरोदर होती आणि दुसरीकडे हा भयंकर आजार. मी तिला तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. तपासणीत तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. २४ तास मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. तिच्या काळजीने अस्वस्थ झालो होतो. तिची प्रकृती बिघडतच चालली होती. तिच्यावर कुठल्याच औषधाचा परिणाम होत नव्हता. त्यानंतर एके दिवशी आमच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले की जान्हवीला वाचवणे आता शक्य नाही.

तो क्षण माझ्यासाठी इतका धक्कादायक होता की, मला अश्रू अनावर झाले. माझा जीव असलेली जान्हवी मला सोडून कशी जाईल? पाणावलेल्या डोळयांनी कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो.

मला सुरुवातीपासून आजपर्यंतची जान्हवीची प्रत्येक गोष्ट आठवत होती आणि मग अचानक मला जान्हवीने माझ्याकडून घेतलेले वचन आठवले. शेवटी जवळ असण्याचे वचन. मिठीत घेऊन शेवटचा निरोप देण्याचे वचन.

मला माहीत होते की, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचा मृतदेहही कुटुंबीयांना दिला जात नाही. मृत्यूपूर्वी रुग्णाला प्लास्टिकचे आवरण घातले जाते. जान्हवी पुन्हा कधीच दिसणार नाही, तिला स्पर्श करता येणार नाही, अशी वेळ जवळ आली आहे हेही मला समजत होते. मी माझे वचन नक्की पूर्ण करेन, असे मी मनोमन ठरवले होते.

मी इतर डॉक्टर आणि परिचरिकांसह जान्हवीच्या खाटेपासून थोडया अंतरावर उभा होतो. सर्वांनाच काळजी वाटत होती. तेव्हाच मी माझा गाऊन काढला, हातमोजे काढले आणि त्यानंतर मास्क काढू लागलो. प्रत्येकजण मला असे करण्यापासून रोखत होता. एका डॉक्टरने तर मला पकडून राहण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही.

मला माहीत होते की, आता नाही तर मग पुन्हा कधीच नाही. मी पुढे गेलो. जान्हवीजवळ जाऊन तिच्या बाजूला बसलो. तिचा हात माझ्या हातात घेतला. माझा स्पर्श होताच मोठया कष्टाने तिने तिचे बंद डोळे उघडले. काही क्षण मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघत राहिली. मग मी तिच्या ओठांना स्पर्श केला आणि तिला माझ्या हातांनी आधार दिला. आमच्या दोघांच्या डोळयांतून अश्रू वाहत होते.

तेवढयात जान्हवी माझ्यापासून दूर झाली आणि कसेबसे स्वत:च्या ओठांवर बोट ठेवून मला हातवारे करू लागली, ‘‘नाही अमन नाही. कृपया जा, अमन, जा… माझे तु?यावर खूप प्रेम आहे.’’

‘‘माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे…’’ असे म्हणत मी तिला पुन्हा एकदा स्पर्श केला, पण तिच्या हट्टामुळे मला तिथून उठून लांब जाऊन उभे राहावे लागले.

माझ्या सहकारी डॉक्टरांनी मला लगेच सॅनिटायझर दिले. माझ्या हातांसोबत माझे ओठही सॅनिटाइज केले. मला लगेच अंघोळीसाठी पाठवण्यात आले.

अंघोळ करताना मी ढसाढसा रडत होतो, कारण जान्हवीसोबतची ती माझी अखेरची भेट होती हे मला माहीत होते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...