इर्षा नेहमीच वाईट नसते

* पूनम पांडे

इर्षा किंवा द्वेष या भावनेकडे हल्ली मानसोपचारतज्ज्ञ व समाजसुद्धा एका नव्या दृष्टीने पाहू लागले आहेत. त्यांचा शोध असे सिद्ध करत आहे की जर कोणाची प्रगति पाहून तुम्हाला इर्षा वाटत असेल तर घाबरण्यापेक्षा याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. जर या इर्षेतून प्रेरणा घेऊन आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती बदलू लागेल. याचा फायदा असा होईल की या इर्षेमुळे तुमचे नुकसान होण्याऐवजी तुम्हाला आनंदाचा मार्ग मिळेल.

दुसऱ्यांची प्रगति किंवा यश पाहून इर्षेने जर तुम्हीही चांगले प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला तर ही इर्षा तुमच्यासाठी सुखद ठरू शकते. हे भविष्यासाठी शुभ संकेत आहेत.

नवे प्रयोग करा

असं म्हणतात की भावनांना कुणी थोपवू शकत नाही, पण आपला दृष्टीकोन तर बदलता येऊ शकतो ना? सांगण्याचे तात्पर्य हेच की दृष्टीकोन जर सकारात्मक बाळगून स्वत:ला चांगल्या वातावरणासाठी तयार करत राहावे नाहीतर फक्त इर्षाच केल्याने मानसिक शांती हरवून जाईल. बरोबरच हृदय, यकृत, रक्तदाब इ. आजारही तुमच्या शरीराचा ताबा घेतील.

वेळेचे महत्त्वं ओळखून आपल्या इर्षेचा लाभ करून घेतला जाऊ शकतो. म्हणजे जगही नवनवे प्रयोग करून प्रगती साधत आहे, तर तुम्हीही करून पाहा. जर काळाप्रमाणे नाविन्य आणि ताजेपणा अपेक्षित असेल तर तुम्हीही असेच करण्याकडे लक्ष केंद्रित करा.

लक्ष्य ठरवा

मनात जर इर्षेची भावना जोर धरत असेल तर आपले लक्ष्य एखादे ध्येय गाठण्याकडे वळवा. याचा खूप फायदा होऊ शकेल. याबाबतीत आळशी व कामचोर लोक फक्त विचारच करत बसतील व वेळेला दोष देत राहतील. पण ध्येय गाठणारे लोक स्वत:चा तोल ढळू देत नाहीत. पटकन् आपल्यातील कमतरता ओळखतात व आपले ध्येय निश्चित करतात व इर्षा नावाच्या या रोगाला आपले औषध बनवतात.

मुल्यांकन करा

आपली स्पर्धा स्वत:शीच करणे हे अतिउत्तम असतं म्हणजे दरदिवशी मागील दिवसापेक्षा चांगले व उत्तम बना. यासाठी एक दिनदर्शिका तयार करणे खूपच उपयुक्त ठरते. स्वत:चं खरंखुरं मुल्यांकनही करता आलं पाहिजे. यात दिनदर्शिकेची खूप मदत होते. काळचक्र आणि प्रकृती आपल्यासाठी नेहमी चांगली व्यवस्था करून ठेवत असते. यावर अवश्य विचार करत राहिलं पाहिजे.

स्वत:शीच विचारविनिमय केला तर आपल्याला आपल्यातील उणिवा कळून येतील. आपल्यातील कमतरतेलाच आव्हान बनवून हिम्मत ठेवणे खरोखर एक उत्तम पर्याय आहे. अजिबात घाबरू नका. बस्स, नाराजी व तक्रारींमध्ये थोडीशी कपात करून शक्यता जागृत करा व जीवनाला सावरून घ्या.

स्त्रीला गुलाम बनविणाऱ्या धार्मिक कथा

* सरस्वती रमेश

लहानपणी आई अनेकदा एक कथा सांगत असे. एका सती महिलेच्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला होता. सती पतीला टोपलीमध्ये बसवून नदीच्या काठी स्नान घालण्यासाठी नेत असे. एके दिवशी तिथल्या नदीकाठी एक वेश्या स्नान करीत होती. कुष्ठरोगी त्या वेश्येच्या प्रेमात पडला. त्यानंतर कुष्ठरोगी उदास राहू लागला. जेव्हा पत्नीने त्याच्या दु:खाचे कारण विचारले तेव्हा कुष्ठरोग्याने तिला सर्वकाही सांगितले. पत्नीने पतीला धीर दिला आणि त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर दररोज पहाटे सती स्त्री गुप्तपणे त्या वेश्याच्या घरात शिरायची आणि तिची सर्व कामे करून परत यायची. घरातील सर्व कामे कोण करते म्हणून वेश्या आश्चर्यचकित होती. एक दिवस वेश्याने सती स्त्रीला पकडले आणि तिला कारण विचारले. जेव्हा त्या महिलेने तिला तिच्या पतीच्या प्रेमाबद्दल सांगितले तेव्हा वेश्याने त्याला घेऊन आणण्यास सांगितले. ती स्त्री आनंदाने घरी गेली. तिने नवऱ्याला ही बातमी सांगितली. तिने पतीसाठी नवीन कपडे काढले आणि अंघोळ घालून त्याला वेश्याच्या घरी नेण्यासाठी नदीकडे चालू लागली. वाटेत काही क्षणांसाठी टोपली तिथेच झाडाखाली उतरवून ती विश्रांती घेऊ लागली. तिच्या पतीच्या कुष्ठरोगी देहातून वास येत होता. तेथूनच काही साधू-संत जात होते. साधूंना दुर्गंधी सहन झाली नाही तेव्हा त्यांनी शाप दिला की ज्या जीवापासून ही दुर्गंधी येत आहे तो सूर्यास्त होण्याबरोबरच मृत्यूला प्राप्त व्हावा.

सतीने त्यांचा आवाज ऐकला आणि नंतर सूर्याकडे वळून म्हणाली, ‘‘मी बघतेच की सूर्य माझ्या इच्छेविरुद्ध कसा अस्त होतो ते.’’

कथेनुसार स्त्रीच्या सतीत्वात परम शक्ती होती, ज्यासमोर सूर्यदेवालाही झुकावे लागले आणि सूर्य तिथल्या तिथेच थबकला.

अनेक स्त्रियांनी ही कहाणी आपल्या वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यात ऐकली असेल. वास्तविक, ही केवळ एक कथा नाही तर आपल्या धार्मिक कथा-गोष्टींमधून पाजल्या जाणाऱ्या बाळगुटीचा एक नमुना आहे. बहुतेक धार्मिक कथा-गोष्टींमध्ये नैतिक शिकवण आणि प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रणालींची बाळगुटी स्त्रियांनाच पाजली जात राहिली आहे.

स्त्रियांसाठी वर्षातील बहुतेक दिवस निर्जल व्रत, उपवासाचे कर्मकांड आहे, परंतु पुरुषांनी नेहमीच उपासाच्या आसनावर विराजमान रहावे. कथेच्या माध्यमातून महिलेला तिचे सतीत्व शिकवले गेले आहे, जर पती कुष्ठरोगी झाला तर त्याची सेवा करून आणि पती कोणाच्या प्रेमात पडला तर त्याला त्याच्या प्रेमिकेशी भेटवून त्या स्त्रीला सती आणि पतिव्रता यासारख्या नावांनी सुशोभित केले जाते. तिच्याकडून कोणतीही कठोर परीक्षा घेतली जाऊ शकते.

धार्मिक कथांचे पाठ

या कथा-कहाण्या स्त्रियांची स्वतंत्र सत्ता व अस्तित्व स्वीकारतच नाहीत.

मनुने तर असेही म्हटले आहे :

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।

पुत्रो रक्षति वार्धक्ये न स्त्री स्वातंत्र्यमर्हंति॥

म्हणजे स्त्रीला मुक्त सोडले जाऊ नये. बालपणात वडील, तारुण्यात पती आणि त्यानंतर मुलाच्या स्वाधीन ठेवले पाहिजे.

केवळ हिंदू धर्माच्या कथांमध्येच नव्हे तर यहुदी, इस्लामच्या धार्मिक कथांमध्येही ती स्त्री असल्यामुळे अत्याचाराला बळी पडली आहे.

इस्लामशी संबंधित कथांमध्ये महिलांना आपल्या पतीची सेवा आणि पडद्यात राहण्याचा सल्ला बहुतेक वेळा मिळतो. त्याचप्रमाणे २ स्त्रियांची साक्ष १ पुरुषाच्या बरोबरीची मानली जाते.

बहुतेक धार्मिक कथा-कहाण्यामध्ये महिलांना हाच धडा शिकविला जातो की पतीची सेवा करण्यापासून त्याच्या लैंगिक इच्छेची पूर्तता करणे हे प्रत्येक स्त्रीचे परम कर्तव्य आहे. स्त्रियांना पतिव्रता, नवऱ्याचे अनुसरण करण्याची आणि प्रत्येक परिस्थितीत मर्यादेचे पालन करण्याची शिकवण दिली जाते. पावलोंपावली महिलेच्या सहनशक्तीच्या परीक्षेचा उल्लेख मिळतो.

लैंगिक असमानतेने भरलेल्या या कथा-कहाण्या किंवा प्रवचने ऐकून स्त्रिया स्वत:ला निकृष्ट दर्जाचे मानू लागतात. आयुष्यभर या कथा-कहाण्यांचा त्यांच्या मनावर खोलवर प्रभाव टिकून राहतो.

रामायण हा एक असा धार्मिक ग्रंथ आहे, जो प्रत्येक घरात बघावयास मिळतो. रामायण कथेच्या प्रभावाबद्दल विचार करतांना रामायण मालिकेच्या वेळी घरांमध्ये पसरलेल्या शांततेची आठवण उत्स्फूर्तपणे येते. याच रामायण कथेत सीता गर्भवती असताना मर्यादेच्या नावावर जंगलात सोडली गेली होती. तरीही राम निर्दोष असल्याचे वर्णन केले गेलं. रामायण सीतेच्या वेदनेबद्दल शांत आहे. हीच कहाणी रामलीलेच्या माध्यमातून निरक्षर महिलांपर्यंत पोहोचते.

त्याचप्रमाणे महाभारतात कौरवांच्या सभेत जुगारात आपल्या पत्नीला डावावर लावण्याची कहाणी आहे. जुगारात द्रौपदीला गमावण्याचा व निर्वस्त्र होण्याचा हुकूम ऐकूनही पती गप्प बसल्याचा उल्लेख आहे. ही कसली सभ्यता होती, जिथे राजाच्या सभांमध्ये बसलेली प्रत्येक उच्चपदस्थ व्यक्ती एका स्त्रीच्या शोषणावर मौन बाळगुन आहे? द्रौपदीने ओरडून-ओरडून मदत मागितल्यानंतरही दुर्योधनाचा लहान बंधू विकर्णखेरीज कोणत्याही शक्तिशाली सदस्याचे मौन तुटत नाही.

प्रकरण फक्त रामायण किंवा महाभारताच्या कथेपुरतेच मर्यादित नाही. महिला वर्षभर जितके काही व्रत-उत्सव करतात त्यांच्या कथांमध्ये लैंगिक फरक स्पष्ट झळकतो. करवाचौथ, हरतालिका तीज व्रत, वट सावित्री पूजा अशा सर्व उपवासांच्या कथांमध्ये महिलांचे स्तर कमी लेखून प्रस्तुत केले गेले आहेत. ऋषि पंचमी व्रताच्या कथेनुसार विदर्भ नावाच्या ब्राह्मणाच्या कन्येच्या शरीरात यामुळे किडे पडले, कारण मासिक पाळी असूनही तिने स्वयंपाकघरातील भांडयांना स्पर्श केला होता.

मासिक पाळीचा शाप

या प्रकारच्या कथा स्त्री होण्याला एखाद्या शापाप्रमाणे दर्शवितात आणि त्यांच्या मासिक चक्राला पापी कृत्यासारखे आच्छादित करतात. अशा कथांमुळेच स्त्रिया मासिक पाळीला त्यांच्या शरीरात एखाद्या विकारासारखे स्वीकारतात आणि एखाद्या दोषाप्रमाणे आपल्या आयुष्यात घेऊन जगतात. धार्मिक कथांमध्ये मासिक पाळीशी संबंधित हजारो नियम आहेत, त्यातील काही नियम आजही महिला पाळत आहेत. या नियमांचे कोणतेही तार्किक आधार किंवा ठोस कारण दिसून येत नाही, परंतु या नियमांचे पालन करतांना स्त्री स्वत:ला निकृष्ट निर्मिती म्हणून अवश्य मानू लागते.

स्त्री शरीराची शुद्धता

धार्मिक कथा विश्व स्त्री शरीराच्या शुद्धतेवर इतके अधिक केंद्रित आहे की जर तिचे शील-भंग इच्छेने किंवा अनिच्छेने झाले असेल तर ते मृत्यूच्या बरोबरीचे मानले जाते. असे थोडेच अपवाद असतील, ज्यात स्त्रीचे शील-भंग होऊनही तिला सारे अधिकार देण्यात आले असतील. तिचे मन गौण मानले जाते. याचा परिणाम असा झाला की ज्या मुलींचे इच्छेने वा अनिच्छेने शील-भंग झाले त्या पश्चातापाने भरल्या गेल्या. कधी-कधी त्यांनी शापित होऊन दगड बनणे स्वीकार केले तर कधी अग्निमध्ये स्वत:ला झोकून देणे.

कुमारिका आणि कुंवाऱ्या शरीराची संकल्पना या कथांमधून निघून आपल्या समाजात अशा प्रकारे पसरली आहे की मुलीसाठी कुंवारेपण आणि पवित्रताच तिच्या सर्व योग्यतांचा आधार बनून जाते. कुंवारेपणाची ही संकल्पना बरेच समाज आणि धर्मांमध्ये बालविवाहाच्या कुप्रथेचे कारण बनली. शिक्षणाचा प्रचार-प्रसार असूनही ही वाईट प्रथा आजही बऱ्याच ठिकाणी सुरू आहे, तिचा अधिकतर दुष्परिणाम बाल वयात गर्भवती होणाऱ्या मुलींच्या वाटयाला येतो.

नात्यांचे वेगवेगळे अर्थ

आपल्या धार्मिक कथांमध्ये एखाद्या राजाच्या २ किंवा ४ राण्या आणि एखाद्या दुसऱ्या सौंदर्यवतीशी संबंध सामान्य गोष्टी आहेत. यासाठी त्याला ना खेद असतो, ना ही समाजासाठी जबाबदार. परंतु जर एखाद्या स्त्रीने लग्नानंतर पर पुरुषाशी संबंध स्थापित केले तर ती केवळ छळाचाच नव्हे तर सामाजिक बहिष्काराचादेखील बळी ठरते. पुरुष कामवासनेच्या अधीन होऊन संबंध स्थापित करतो, परंतु हेच काम जर स्त्री करत असेल तर तिला समाजात व्यभिचारी, चारित्र्यहीन इत्यादी नावे दिली जातात.

पत्नीचा सहज त्याग

धार्मिक कथांमध्ये पत्नीचा त्याग करणे सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक पावलोपावली बायकोला नाकारले जाते, त्याग केली जाऊ शकते, परंतु पुरुषाचा त्याग करणारी स्त्री सहसा आपल्या धार्मिक कथांमध्ये जन्माला येत नाही किंवा पुरुषाला अशा प्रकारे त्यागण्याची पत्नीसाठी कोणतीही परंपरा सापडत नाही. स्त्रीला दुय्यम समजण्याचा सर्वात जागृत प्रकार सती प्रथा होती, ज्यात सतीची नियमानुसार पूजादेखील केली जात असे. आजही काही ठिकाणी सती चबुतरे आहेत, जिथे नियमाने जत्राही भरते.

धार्मिक कथांमध्ये समाविष्ट असलेल्या या सर्व गोष्टी स्त्रियांची धर्मनिष्ठा आणि त्यांच्या अत्याधिक सहनशीलतेचे कौतुक करून त्यांना समानतेच्या अधिकारापासून वंचित ठेवतात, स्त्रीवर अधिकार गाजवण्याचे साधन म्हणून काम करतात. ज्या कथांमध्ये स्त्री-पुरुष समानतेसारख्या मूलभूत मानवी मूल्यांची कमतरता आहे त्यांना खऱ्या अर्थाने धार्मिक मानले जाऊ शकत नाही.

लैंगिक समानतेचा हक्क मिळविण्यासाठी महिलांना या धार्मिक कथांद्वारे निर्मित आदर्श स्त्रीच्या मापदंडांचा नाकार करून त्यांच्या वर्तुळातून बाहेर पडावेच लागेल.

जेव्हा येऊ लागतात अश्लील मेसेज

* गरिमा

‘‘हाय प्रिया.’’

अनोळखी नंबरवरुन आलेला कॉलवरुन अपरिचित व्यक्तीने आपले नाव घेतल्यामुळे प्रियाला आश्चर्य वाटले, पण नंतर तिने असा विचार केला की, कदाचित तो तिला ओळखत असेल. त्यामुळेच तिने विचारले, ‘‘तुम्ही कोण?’’

‘‘तू ज्याला आवडतेस तोच, आणखी कोण?’’

समोरच्याच्या बोलण्यात खोडसाळपणा होता. बोलायचे नसतानाही प्रियाने उत्सुकतेने विचारले, ‘‘तुमचे काही नाव तर असेल ना?’’

‘‘तुला जे हवे ते नाव ठेव, तुझ्या नरम, गुलाबी ओठांवर कुठलेही नाव सुंदरच वाटेल…’’

मी कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलत नाही, असे सांगत प्रियाने त्याच्या उद्धट बोलण्याला पूर्णविराम लावत फोन कट केला.

पण हे काय? अर्ध्या तासाच्या आतच त्याच नंबरवरुन पुन्हा फोन आल्यामुळे प्रिया अस्वस्थ झाली. त्यानंतर फोन घेऊन कठोर शब्दात बोलली की, ‘‘हू इज धिस… डिस्टर्ब का करत आहेस?’’

‘‘मी  तर मैत्री  करू इच्छितो.’’

‘‘पण मी अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत नाही.’’

‘‘अनोळखी कुठे? थोडया वेळापूर्वीच तर बोलणे झाले होते तुझ्याशी. आता नावाचे विचारत असशील तर लोक मला राज म्हणून ओळखतात. आणि जर ओळखीबाबत बोलायचे तर तुझ्याच एका मित्राकडून तुझा नंबर मला मिळाला.’’

‘‘ठीक आहे, बोल, काय बोलायचे आहे तुला?’’

‘‘हेच की, तुझी नजर एखाद्या खंजीरसारखी काळजात घुसते. खरंच तू जर समोर असली असतीस तर…’’

‘‘तर काय…’’ प्रियाने मध्येच त्याला थांबवत विचारले.

त्यानंतर थोडे लडिवाळ बोलणे, थोडे उलट बोलणे, थोडे रोमँटिक आणि थोडया अश्लील गोष्टी बोलण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला प्रियाला एखाद्या अनोळखी माणसाबरोबर असे बोलण्यात संकोच वाटत होता, पण त्याच्या बिनधास्त वागण्यामुळे हा संकोचही दूर झाला. त्यानंतर प्रियालाही मजा वाटू लागली. तो तरुण हळूहळू प्रियासोबत अश्लील बोलू लागला. एक-दोनदा प्रिया त्याला ओरडली. त्यानंतर बिनधास्त बोलू लागली. पुढे दोघे एकमेकांना भेटू लागले. मग एक दिवस त्याने प्रियाला आपल्या घरी बोलावले आणि मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

अशा घटना बऱ्याचदा मुली आणि महिलांसोबत घडतात. अनेकदा तर विवाहित महिलांनाही अशा अनोळखी व्यक्तीचे कॉल घेऊन त्याच्याशी गप्पा मारण्याची सवय लागते, हीच सवय नंतर त्यांच्यासाठी मोठया समस्येचे कारण ठरते.

याचप्रमाणे, दिल्लीतील ४४ वर्षीय आणि २ मुलांची आई असलेल्या सुधाने हे मान्य केले की, एका फेक कॉल करणाऱ्याच्या जाळयात अडकून तिनेही सुखसमाधान, सोबतच दीड लाख रुपये गमावले.

तिने सांगितले की, एकदा चुकून ती एका राँग नंबरसोबत बोलली आणि त्यानंतर झालेल्या ओळखीतून त्याच्या प्रेमात पडली. या दोघांमध्ये हे नाते खूप दिवस टिकले. एके दिवशी मोबाईलवर अतिशय घाबरलेल्या आवाजात त्या तरुणाने तिला सांगितले की, त्याच्या बहिणीचा अपघात झाला आहे आणि त्वरित ऑपरेशन करायचे आहे. डॉक्टर अडीच लाख रुपये मागत आहेत. पण इतक्या घाईत तो फक्त दीड लाखांची व्यवस्था करू शकला. शक्य झाल्यास १ लाखांची मदत कर. सुधा त्याच्यात इतकी गुंतली होती की, त्याला नाही म्हणूच शकली नाही. तिने तत्काळ १ लाख रुपये त्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. अशाच प्रकारे, अन्य काही कारणे देवून त्याने सुधाकडून आणखी ५० हजार रुपये उकळले. पुढे तो सुधाच्या आयुष्यातून निघून गेला. त्यानंतर सुधाच्या हे लक्षात आले की, तिची चांगलीच फसवणूक झाली आहे.

अशाच प्रकारे काही अनोळखी कधीकधी महिलांना बदनाम करण्याचाही प्रयत्न करतात. एखाद्या मुलीने किंवा महिलेने विरोध केल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली जाते. घडलेल्या या घटनांकडे पहा :

१२ एप्रिल, २०१९

मेहरौली : एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेला पवन (वय २५) हा तरुण सोशल मीडियावर आपल्याच पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांशी मैत्री करुन त्यांना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवत असे. त्यांच्याशी घाणेरडया गप्पा मारत असे. स्वत:चे अश्लील फोटो त्यांना पाठवत असे. महिलांनी विरोध करताच हातात चाकू असलेला आपला फोटो पाठवून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत असे. त्याला कोणी पकडू नये म्हणून सोशल मीडियावर सतत आपला आयडी बदलत असे.

१० मार्च, २०१८

रांचीमधील एक अभिनेत्री जिने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात काम केले आहे, तिला बनावट फेसबुक आयडी बनवून एक व्यक्ती अश्लील मेसेज आणि फोटो पाठवत होता. तिने या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली.

बनावट फेसबुक आयडी तयार करणारी ही व्यक्ती महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करत असे. त्यानंतर त्यांना बदनाम करण्याची धमकी देत असे.

१ एप्रिल, २०१९

उज्जैनच्या शिवाजी कॉलनीत राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला एक अनोळखी व्यक्ती सतत अश्लील मेसेज आणि फोटो पाठवत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक करताच तो दुसऱ्या नंबरवरुन तिला त्रास देऊ लागला. तिने त्याच्या वागण्याला विरोध करताच तिच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

महिला काय करतात?

६२ टक्के महिला त्या अनोळखी कॉलरचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. १६ टक्के महिला सोशल मीडियावर याची वाच्यता करतात. स्क्रीन शॉट्स आणि नंबर शेअर करतात. १ टक्के महिला या आपल्या कुटुंबातील एखादा पुरुष किंवा मित्राला कॉल घ्यायला सांगतात. ११ टक्के महिला स्वत:चा नंबर बदलतात. ३२ टक्के अशा कॉलकडे दुर्लक्ष करतात. तर ९२ टक्के महिला थेट तो नंबरच ब्लॉक करुन टाकतात.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी सुमारे ५० टक्के महिलांना असा अश्लील कॉल आठवडयातून एकदा आला, तर ९ टक्के महिलांनी हे मान्य केले की, त्यांना रोजच अशा कॉल्सना सामोरे जावे लागते.

कोण पाठवतात अशा प्रकारचे मेसेजे?

सर्वेक्षणानुसार, अश्लील कॉल किंवा मेसेज करणारे ७४ टक्के अनोळखी व्यक्ती असतात. २३ टक्के स्टॉकर्स, तर ११ टक्के महिलांच्या ओळखीतलेच असतात. सर्वेक्षणात सहभागी ५३ टक्क्यांहून अधिक महिलांनी हे मान्य केले की, त्यांना बनावट व फसवणूक करणारे कॉल आले.

फोनद्वारे छळ करणाऱ्यांमध्ये दिल्ली आघाडीवर

दिल्लीमध्ये २८ टक्के महिलांना दर आठवडयात लैंगिक छळाशी संबंधित कॉल किंवा मेसेज येतात, जे इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत जास्त आहेत. इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘इंटरनेट इन इंडिया २०१७’ या अहवालानुसार देशात ५० करोड इंटरनेट यूजर्स आहेत, त्यापैकी ३० टक्के महिला आहेत. देशात इंटरनेटचा सर्वाधिक वापर तरुण आणि विद्यार्थी करतात. खेडयांमध्ये १०० इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ३६ महिला आहेत. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार २०१६ मध्ये देशात महिलांविरोधात सायबर क्राइमची ९३० प्रकरणे नोंदविण्यात आली.

काय करायला हवे?

मैत्री करा विचारपूर्वक : एखाद्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताच ती त्वरित स्वीकारायची, ही प्रवृत्ती सोडून द्या. मैत्री नेहमीच विचारपूर्वक करा.

जाळयात अडकू नका : अश्लील मेसेज आणि बनावट कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या जाळयात कधीच अडकू नका. जर काही कारणास्तव तुम्ही त्याच्याशी मैत्री केलीच असेल तर, कधीही त्याने बोलवताच त्याला भेटायला एकटीने सामसूम ठिकाणी किंवा त्याच्या घरी जाऊ नका. भेटायचेच असेल तर मॉल किंवा मेट्रो स्टेशन अशा खुल्या ठिकाणी भेटा. त्याला तुमच्या वैयक्तिक गोष्टी सांगू नका.

कायद्याचा आधार घ्या : फोनवर कारणाशिवाय मैत्री करायला सांगणे हा गुन्हा आहे. महिलांसोबत अशा प्रकारे छेडछाड केल्यास किंवा विनयभंग केल्यास आरोपीविरोधात कलम ३५४ अन्वये खटला दाखल केला जातो.

महिलांना फोनवर किंवा सोशल माडियाचा आधार घेऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध मैत्री करायला सांगणे हा एकप्रकारचा छळ आहे. अशा प्रकारे, एखाद्याच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणे हा गुन्हा मानला जातो. सतत टेक्स्ट मेसेज पाठविणे, मिस कॉल देणे, फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे, एखाद्या महिलेच्या स्टेटस अपडेटवर नजर ठेवणे आणि सोशल मीडियावर सतत तिच्या मागे लागणे हा आयपीसीच्या कलम ३५४ डी अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.

पोलिसांत तक्रार दाखल करा : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आता अशा प्रकरणांमध्ये सायबर क्राइमअंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी फोनवर मेसेज किंवा अश्लील फोटो पाठविणाऱ्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करत असत, परंतु त्यावर कारवाई करणे अवघड होते, कारण बहुतेक प्रकरणांत मुले बनावट आयडीवर सिमकार्ड घेवून अशाप्रकारचे गैरकृत्य करत असत. त्यामुळेच आता त्यांना धडा शिकवण्यासाठी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन अशा प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे, जेणेकरून गुन्हे शाखा पाळत ठेवून आरोपींवर कारवाई करु शकेल.

ही झाडं घरात लावा, आजारांना दूर पळवा

* गृहशोभिका टीम

निसर्गामध्ये अशा नानाविध गोष्टी आहेत, ज्याद्वारे आपल्या शारीरीक व्याधींवर उपचार होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला काही अशा झाडांविषयी सांगणार आहोत, ज्यांचा रोज वापर केला तर तुम्ही कितीतरी आजारांपासून दूर राहू शकता. चांगली गोष्ट तर ही आहे की ही झाडं तुम्ही आपल्या घराच्या आतसुद्धा लावू शकता.

पुदिना

पुदिन्याची पानं पोटाच्या तक्रारी पळवून लावतात. जर याच्या पानांना आहाराचा भाग बनवलं, तर पचन शक्ती मजबूत होते. त्याबरोबरच पोटातील उष्णतासुद्धा कमी होते.

जराकुश

जराकुश हे हिरव्या आणि पिवळया रंगाचे गवत असते. हे मुळात उष्ण आहे, जराकुश मुतखडयाचा आजार बरा करते. जराकुश चहात टाकून प्यायल्याने ताप उतरतो. याशिवाय जराकुश चावल्याने दात मजबूत होतात.

कडिपत्ता

कडिपत्त्यात भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिड असते. लोह शरीरासाठी एक प्रमुख पोषक तत्व आहे, फॉलिक अॅसिड यांच्या अवशोषणात सहाय्य्क म्हणून काम करतं. यामुळेच हे अॅनिमियापासून आपले रक्षण करते.

कोथिंबीर

कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ असते, जे मधुमेहाला नियंत्रणात ठेवते. कोथिंबिरीच्या दांडया खाल्याने थायरॉईडवरही नियंत्रण मिळवता येते.

तुळस

ज्या घराच्या अंगणात किंवा ज्या भागात तुळशीचे रोप असेल, तिथे जीवजंतू येत नाही. याशिवाय तुळशीच्या सुगंधाने वातावरण स्वच्छ राहते. हीच्या सुगंधात असलेले एस्ट्रोन आपले मानसिक संतुलन नीट ठेवते.

ढग आणि झऱ्यांचे शहर चेरापुंजी

* प्रतिनिधी

चेरापुंजी भारताचे उत्तर-पूर्व राज्य मेघालयातील एक छोटेसे शहर आहे, जे शिलाँगपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. जगात हे ठिकाण पावसासाठी ओळखले जाते. येथील स्थानिक लोक याला ‘सोहरा’ या नावाने ओळखतात. हे शहर बांगलादेशाच्या सीमेपासून खूप जवळ आहे, त्यामुळे येथून बांगलादेशाचे दृश्यही पाहता येऊ शकते. पावसाळयाच्या दिवसांत पर्यटक दूरवरून येथे पर्यटनासाठी येतात. तुम्ही म्हणाल की, पावसाव्यतिरिक्त इथे असे काय आहे की, पर्यटक इथे फिरायला येतात. खरे तर चेरापुंजीमध्ये पावसाबरोबरच नैसर्गिक सौंदर्य, झरे आणि गुहा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

शिलाँगपासून चेरापुंजीकडे जाताना, मार्गात थोडा चढाव, दोन्ही बाजूला डोंगर, दोन डोंगरांच्या मधून घाटरस्ते, अननसाची झाडे, सुंदर पाने असलेली इतर झाडे आणि अनेक प्रकारच्या वनस्पती पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनतात. चेरापुंजीपासून थोडे पुढे जाताच, ६ किलोमीटर अंतरावर मास्माई गुहा आहे. ही गुहा पर्यटक कोणत्याही तयारी किंवा गाइडशिवाय सहजपणे फिरू शकतात. १५० मीटर लांब असलेली ही गुहा बाहेरून पाहताना थोडीशी भीती जरूर वाटते. मात्र, तुम्ही याच्या आत प्रवेश करता, तेव्हा तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे जवळून दर्शन होते. गुहेच्या आतील भागांत अनेक प्रकारचे जीवजंतू आणि झाडांचे वास्तव्य आहे. गुहेत अनेक वळणे व घुमावदार मार्ग आहेत, ज्यामुळे रोमांचक अनुभव घेता येतो. गुहेमध्ये प्रवेश करताच, आपणास जराही घाण दिसणार नाही. गुहेमध्ये लाइटची योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तरीही आपण आपल्यासोबत टॉर्च जरूर घेऊन जा. जेणेकरून गुहेतील सौंदर्य व्यवस्थित पाहता येईल.

सतत पाणी टपकत असल्यामुळे येथील रस्ता बुळबुळीत झालेला आहे, त्यामुळे गुहेमध्ये चालताना सांभाळून चाला. गुहेत ४-५ रस्ते असेही आहेत, जे उंचावर आहेत. तिथे आपल्याला चढूनच जावे लागेल. इथे उंच असलेल्या लोकांना थोडा त्रास होऊ शकतो. त्यांना गुहेमध्ये काही ठिकाणी वाकून जावे लागेल. गुहेमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला तिकीट काउंटरवरून तिकीट घ्यावे लागेल. इथे १० वर्षांपर्यंतच्या मुलांना प्रवेश नि:शुल्क आहे, तर १० वर्षांवरील पर्यटकांना २० रुपये तिकीट घेणे अनिवार्य आहे. जर कॅमेरा आत घेऊन जायचा असेल, तर तुम्हाला २५ रुपयांचे वेगळे तिकीट घ्यावे लागेल. ही गुहा सकाळी ९ वाजता पर्यटकांसाठी खुली होते. ज्या लोकांना पाय, गुडघे आणि पाठीचे दुखणे आहे, त्यांनी या ठिकाणी जाणे टाळावे. कारण त्यांना चढण्या-उतरण्यात त्रास होऊ शकतो. इथे जाताना आरामदायक कपडे वापरा. उदा. ट्रॅक पँट किंवा लोअर वगैरे. त्याचप्रमाणे, इथे कधीही चप्पल किंवा हाय हिल घालून जाऊ नका. इथे स्पोर्ट्स शूज वापरणेच योग्य ठरेल.

गुहेबाहेर अनेक छोटी-छोटी हॉटेल्स आणि चहा-कॉफीची दुकाने आहेत. तिथे आपणास खाण्या-पिण्याचे अनेक पदार्थ मिळू शकतील. आपल्याकडे वेळ असेल, तर चेरापुंजीपासून केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर नोहकालिकाई झरा आहे, तो अवश्य पाहा. हा भारतातील सर्वांत उंच झरा मानला जातो. हा ११०० फूट उंचावरून कोसळतो. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल, तर समजून जा, हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे. जसजसे तुम्ही या झऱ्याजवळ जाता, तसतसा उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज आपल्या कानात घुमू लागतो आणि पाणी पाहून पाण्यात एक डुबकी घ्यायची इच्छा होते. झऱ्याच्या बरोबर समोरून व्ह्यू पॉइंटवरून झऱ्याचे सौंदर्य न्याहाळत राहावे, इतके सुंदर दिसते. तुम्हाला हा झरा आणखी जवळून पाहायचा असेल, तर दगड आणि डोंगरांच्या सहाय्याने चढून आजूबाजूचे अनेक छोटे-मोठे झरे जवळून पाहू शकता, भिजण्याचा आनंद लुटू शकता आणि खडकांवर चढून फोटोही काढू शकता, परंतु लक्षात ठेवा, इथे थोडे बुळबुळीत असते. त्यामुळे सेल्फी घेण्याच्या नादात आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका. पावसाळयाच्या दिवसांत इथे जाणे थोडे जोखमीचे असते. कारण पावसात ढगांमुळे झरा स्पष्ट दिसत नाही. तुम्ही जर डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान गेलात, तर कदाचित तुम्हाला झऱ्यात पाणी दिसणार नाही. म्हणूनच इथे पावसाळयानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात जा.

त्या दिवसांत येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते. धुक्यातून वाहणाऱ्या ढगांची ओलसर हवा तुम्हाला आकाशात विहार करत असल्याची अनुभूती देईल. झऱ्यातून वाहणारे पाणी आणि आजूबाजूचे दृश्य आपणास पूर्णपणे रिलॅक्स करते. इथे पोहोचणे खूप सोपे आहे. शिलाँग व चेरापुंजीमधील रस्ता परिवहनाच्या दृष्टीने खूप उत्तम आहे. इथे खासगी वाहनांबरोबरच सरकारी परिवहनाची साधनेही नेहमी उपलब्ध असतात. इथे झऱ्याजवळच बांबूपासून बनलेली खेळणी विकली जातात, ती खूप वेगळी असतात. पर्यटक ती खरेदी केल्याशिवाय पुढे जात नाहीत. इथे एक बाजारही आहे. तिथे स्थानिक स्मृतिचिन्ह असलेल्या वस्तू मिळतात. इथे फिरायला गेलात, तर दालचिनी अवश्य खरेदी करा. तुम्ही दालचिनी नेहमी छोटया-छोटया तुकडयांत पाहिली असेल, परंतु इथे दालचिनी काठीच्या रूपात मिळते.

कसे तयार होतात शृंगार आणि प्रेमाचे दागिने

* गरिमा पंकज

सोन्याच्या दागिन्यांबद्दल महिलांचा झुकाव कोणापासून लपून राहिलेला नाही. कधी एखाद्या आपल्याचे प्रेम आणि आसक्तीचे प्रतीक म्हणून, कधी गुंतवणूकीच्या माध्यमाप्रमाणे शृंगाराचे प्रतीक म्हणून, तर कधी सुख-दु:खाचे साथीदार बनून या दागिन्यांना महिलांच्या जीवनात विशेष स्थान आहे. परंतु आपणास माहिती आहे काय की देशातील बऱ्याच प्लांट्समध्ये हजारो कारागीर आधुनिक मशीनींच्या मदतीने सोन्याचे दागिने बनवतात? एक रत्नजडित दागिना कित्येक चरणांतून होत आपल्या हातात पोहोचतो.

या संदर्भात तनिष्कच्या पंतनगर ज्वेलरी प्लांटच्या युनिट हेड अँजेलो लॉरेन्सने संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे स्पष्ट केली :

* सर्व प्रथम ज्वेलरी डिझाइनर कोणत्याही दागिन्यांची एक रूपरेषा तयार करतात आणि कागदावर कोरतात, ज्याला संगणकाद्वारे कॅड डिझाइन (संगणक अॅडेड डिझाइन)मध्ये रूपांतरित केले जाते.

* त्यानंतर त्या कॅड डिझाइनला ३ डी प्रिंटरद्वारे मुद्रित केले जाते, ज्याला रेझिन प्रोटोटाइप म्हणतात.

* राळला द्रव मोल्डच्या साच्यात मिसळले जाते आणि त्यातून प्रथम चांदीचा नमुना तयार केला जातो, याला मास्टर म्हणतात. त्या मास्टरच्या मदतीने सिलिकॉन मोल्ड कापून त्यामध्ये मेण घातले जाते.

* आपल्याला अंगठीमध्ये हिरे लावायचे असल्यास या चरणात कारागिर सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने मेणाच्या तुकडयात योग्य जागी हिरे सेट करतात.

* यानंतर अनेक वॅक्सचे दागिने एका वॅक्स ट्रीच्या बेसमध्ये जोडले जातात. त्यानंतर हे वॅक्स ट्री पुढील विभागात सोन्याच्या कास्टिंगसाठी पाठविले जाते, जेथे गोल्ड ट्री, लॉस्ट वॅक्स कास्टिंग पद्धतीने तयार केले जाते.

* गोल्ड ट्री तयार करण्यासाठी, सर्व प्रथम ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मिश्रणामध्ये ठेवले जाते. ७-८ मिनिटांत सुकून कडक होणारे, प्लास्टर ऑफ पॅरिसने झाकलेले, हे झाड भट्टीमध्ये ५०० ते ६०० डिग्री तापमानात १६ तास गरम केले जाते.

* त्यानंतर गरम मिश्रणाला यूएसएमधून मागवलेल्या जेट इंजिन मशीनमध्ये घातले जाते. येथे प्लास्टर ऑफ पॅरिसमधील मेण विरघळते आणि रिक्त साचा राहून जातो. जेव्हा मशीनचे तापमान १,०९० डिग्री असते, तेव्हा मशीनमध्ये सोने ओतले जाते.

* पिवळा रंग सोन्याचा नैसर्गिक रंग आहे, तर सोन्याला पांढरा रंग देण्यासाठी त्यात पॅलेडियम आणि निकेल मिसळले जाते, तर गुलाबी रंगासाठी त्यात २५ टक्केपर्यंत तांबे जोडले जाते. अशा प्रकारे पांढरे सोने आणि गुलाबी सोने तयार केले जाते.

* रिकाम्या साच्यांमध्ये सोने आणि मिश्र धातु भरतात तेव्हा अंगठया त्यांचा आकार घेतात. हे गोल्ड ट्री बाहेर काढले जाते आणि कारागिरांकडून काळजीपूर्वक अंगठया वेगवेगळया केल्या जातात. नंतर त्यांची गुणवत्ता तपासल्यावर त्यांना डाउनस्ट्रीम प्रक्रियेसाठी पाठविले जाते.

* डाउनस्ट्रीम प्रक्रियेमध्ये दागदागिन्यांना डिझाइनप्रमाणे जोडले जाते. सुंदर चमक देण्यासाठी ४-५ स्टेप्समध्ये पॉलिश केली जाते.

* फॅक्टरीच्या बाहेर पडण्यापूर्वी, प्रत्येक दागिन्यांची गुणवत्ता आधुनिक मशीनींवर ट्रेंड क्वालिटी इन्स्पेक्टरांकडून तपासली जाते. त्यानंतरच, तनिष्क ब्रॅडच्या हॉलमार्किंगसाठी दागिने तयार होतात.

* नंतर प्रक्रियेदरम्यान उडणारे धुळीचे कण गोळा केले जातात आणि त्यांच्यापासून सोन्याची रिकव्हरी केली जाते. १ महिन्यात सरासरी १० ते १०० किलो धुळीचे कण गोळा केले जातात. ज्यामधून २ ते २.५ किलो २४ कॅरेट सोने मिळते.

दागदागिने तयार झाल्यानंतर, तिथून लॉकरमध्ये ठेवले जातात, जेथून ऑर्डरीनुसार त्यांना वेगवेगळया शहरांमध्ये पाठविले जाते. टायटन कंपनीच्या पंतनगर ज्वेलरी युनिटमध्ये तयार झालेले दागिने संपूर्ण प्रक्रियेनंतर देशातील ४०० हून अधिक शोरूम्सद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचतात.

पावसाळी मोसमात फिरून या हे ‘नॅशनल पार्क’

* प्रतिनिधी

पावसाळ्याच्या दिवसांत हिरवा शालू पांघरलेल्या डोंगरदऱ्यांतून फिरणे खूप आनंददायी असते आणि हे ठिकाण राष्ट्रीय उद्यान असेल, तर मजा अजूनच वाढते. मग वाट कसली पाहताय, या पावसाळी मोसमात फिरून या भारतातील प्रसिध्द नॅशनल पार्कमध्ये.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय पार्क आहे. हे १९३६ मध्ये एनडेंजर्स बंगाल टायगरच्या रक्षणासाठी हॅली नॅशनल पार्कच्या रूपात स्थापन करण्यात आले होते. हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात आहे आणि याचे नाव कॉर्बेटच्या नावावर ठेवले होते, ज्यांनी याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. वाघ वाचवा मोहिमेसाठी पुढाकार घेणारे हे पहिले पार्क होते.

पेरियार नॅशनल पार्क

‘पेरियार नॅशनल पार्क’ ही भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य केरळातील इडुक्की आणि पथनामथिट्टा जिल्ह्यात एक रिझर्व्ह एरिया आहे. हा हत्ती आणि वाघांसाठी रिझर्व्ह म्हणून ओळखला जातो. ९२५ किलोमीटरमध्ये वसलेल्या या अभयारण्याला १९८२ मध्ये पेरियार नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आले होते.

ताडोबा नॅशनल पार्क

महाराष्ट्रातील ताडोबा अंधेरी टायगर रिझर्व्ह सर्वात जुने आणि सर्वात मोठे नॅशनल पार्क आहे. हे स्थान बंगाल टायगरसाठीही फेमस आहे. इथे जवळपास ४३ बंगाल टायगर आहेत. भारतात सर्वात जास्त टायगर याच पार्कमध्ये आहेत.

हेमिस नॅशनल पार्क

‘हेमिस राष्ट्रीय उद्यान’ भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्व लडाख क्षेत्रात सर्वात जास्त उंचावर असलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हेमिस भारतात सर्वात मोठे अधिसूचित संरक्षित क्षेत्र आणि नंदा देवी बायोस्फेयर रिझर्व्ह आणि आजूबाजूच्या संरक्षित क्षेत्रांनंतरचे दुसरे सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. हे नॅशनल पार्क अनेक दुर्मीळ सस्तन प्राण्यांच्या प्रजातींबरोबरच हिमचित्त्यांसाठीही ओळखले जाते.

नागरहोल नॅशनल पार्क

कर्नाटकात असलेले नागरहोल आपल्या वन्यजीव अभयारण्यासाठी संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. हे त्या काही ठिकाणांपैकी एक आहे, जिथे आशियाई हत्ती आढळतात. मान्सूनपूर्व पावसात इथे मोठ्या संख्येने रंगीबेरंगी पक्षीही आढळून येतात. वाइल्ड लाइफ आणि अॅनिमल लव्हर्सना इथे पाहण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी खूप काही आहे.

सरिस्का नॅशनल पार्क

‘सरिस्का वाघ अभयारण्य’ भारतातील सर्वात प्रसिध्द नॅशनलपार्कपैकी एक आहे. हे राजस्थानातील अलवर जिल्ह्यामध्ये आहे. १९५५ मध्ये याला ‘वन्यजीव आरक्षित भूमी’ म्हणून घोषित करण्यात आले होते. १९७८ मध्ये वाघ वाचवा परियोजनेनुसार याला नॅशनल रिझर्व्हचा दर्जा देण्यात आला. सरिस्कामध्ये वाघ, चित्ते, बिबटे, रानमांजर, कॅरकल, पट्टेवाला उद, कोल्हा स्वर्ण, चितळ, सांबर, नीलगाय, काळवीट, चौसिंगा मृग त्याला ‘छाउसिंगा’ही म्हणतात. रानटी डुक्कर, ससा, माकड आणि पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजातींबरोबरच भरपूर वन्यजीव पाहायला मिळते.

रणथंभोर नॅशनल पार्क

‘रणथंभोर नॅशनल पार्क’ उत्तर भारतातील मोठ्या नॅशनल पार्क्सपैकी एक आहे. हे जयपूरपासून १३० किलोमीटर, दक्षिण आणि कोटापासून ११० किलोमीटर उत्तर-पूर्वेकडे राजस्थानमधील दक्षिणी जिल्हा सवाई माधोपूरमध्ये वसलेले आहे.

कसा उतरवाल हार्टब्रेकचा हँगओव्हर

* पूनम अहमद

स्वधाचा आपल्या बॉयफ्रेंड राहुलशी ब्रेकअप झाल्याला अनेक महिने उलटून गेले होते. पण ती अजूनही त्याच्याबाबतच विचार करत राहते. ती राहुलला अजूनपर्यंत आपल्या डोक्यातून काढू शकलेली नाहीए.

स्वधाचे म्हणणे आहे, ‘‘रोज सकाळी जेव्हा मी झोपून उठते, पहिला विचार मला राहुलचाच येतो. मग लक्षात येते की आता आम्ही वेगळे झालोय आणि मी रडू लागते. मग मी त्याचे इन्टाग्राम पेज पाहते. त्याला त्याच्या जीवनात पुढे जाताना पाहाते, तेव्हा अजून वाईट वाटते. माझी मित्रमंडळी मलाही आयुष्यात पुढे जाण्यास सांगतात, पण मी काय करू? तो माझ्या डोक्यातून जात नाही. त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही.’’

अनेक महिने उलटूनही स्वधा या ब्रेकअपमधून बाहेर आलेली नाहीए. आपल्यातील अनेक लोक ब्रेकअपनंतरही आपल्या एक्सला विसरण्यासाठी संघर्ष करतात. ज्या व्यक्तिला धक्का बसला आहे, ज्याने प्रेमभंग केलाय, त्याच्याशी नाते संपुष्टात आल्यानंतरही त्याच्याबाबतच विचार करतात. त्याची एवढी जास्त गरज जाणवते की पुन्हा-पुन्हा त्याचे मेसेज, फोटो पाहतात. असे जाणवते की आपण त्याच्याशिवाय अपूर्ण आहोत.

प्रेमही नशा आहे

रिसर्च सांगते की प्रेमाचाही नशेप्रमाणे मेंदूवर परिणाम होतो. जेव्हा एखादे रोमँटिक नाते संपुष्टात येते, तेव्हा तसाच परिणाम होतो, जसा हेरॉइन किंवा अन्य कुठली नशा करणारी व्यक्ती अचानक त्या नशेपासून दूर होते, तेव्हा होतो.

स्वधाचा मेंदूही तसाच प्रतिक्रिया देत होता, जसा एखाद्या व्यसनी व्यक्तिचा देतो. कारण स्वधाला आपला एक्स म्हणजेच तिचं हेरॉइन मिळत नव्हतं. ती स्वत:ला त्याच्या आठवणीत जखडून ठेवत होती. त्या आठवणी थोड्या वेळासाठी तिला सुख देऊ शकत होत्या, पण एक्सला भेटण्याची तिची इच्छा अजून तीव्र होत होती.

हार्टब्रेक एक अशी नशा आहे, ज्यापासून सुटका मिळवणे सोपे नाही. हार्टब्रेकमधून बाहेर पडणे अगदी तसेच आहे, जसे ड्रग्ज, सिगारेट, अल्कोहोल किंवा जुगार खेळण्यासारख्या व्यसनांपासून सुटका मिळवणे. आपला मेंदू आपल्यावर ती नशा किंवा त्या व्यक्ती किंवा मग त्या अॅक्टिव्हिटीशी संपर्क ठेवण्यासाठी प्रेशर निर्माण करतो.

आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावाच लागेल :

* आपल्या एक्सला आपल्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी काँटॅक्टचे सर्व मार्ग बंद करा. आपल्या फोनमधून त्याचा फोननंबर डिलीट करा.

* ब्रीदिंग एक्सरसाइजवर जास्त लक्ष द्या. तोपर्यंत मेडिटेशन करा, जोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवत नाही. अशा इच्छा काही क्षणात संपुष्टातही येतात.

* स्वत:ला बिझी ठेवा. आपला विचारप्रवाह एक्सपासून हटवून दुसऱ्या एखाद्या दिशेला वळवून एवढ्या व्यस्त व्हा की त्याच्याबाबत विचार करायला वेळच राहणार नाही. जे आपण करू शकता, जे करण्यात आपण कुशल आहात, तेच करणे अशा वेळी चांगले असते.

* अधेमधेही आपल्या एक्ससोबत काढलेले चांगल्या वेळेचे फोटो पाहू नका. त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. मग एक्सजवळ जाण्याचीच इच्छा वाढत राहील, जे आपल्यासाठी योग्य नसेल.

* जेव्हा आपण सोबत होता, आपला एक्स आपल्यासाठी आनंद आणि सेफ्टीचे कारण होता. आता तो काळ गेला आहे. आता त्याने आपला प्रेमभंग केलाय. आता तो दुसरेच काहीतरी आहे- एक नशा. या नशेपासून दूर राहा.

हार्टब्रेकमधून बाहेर येण्याचा हाच मार्ग आहे की, आपण जाणून घ्या की आपल्याला आपल्या एक्सची नशा आहे आणि आपल्याला या नशेच्या व्यसनापासून मुक्ती मिळवायची आहे. एक्सला आपल्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी तशाच दृढ इच्छाशक्तीची गरज असते, जशी इतर व्यसनांपासून सुटका मिळवताना आवश्यक असते. मजबूत बना, पक्का निश्चय करा आणि पुढे व्हा. विजय तुमचाच असेल.

कपल्ससाठी स्वर्गाहून सुंदर असं ‘उटी’ हनिमूनसाठी उत्तम पयार्य

* प्रतिनिधी

शिमलामध्ये बर्फ पडायला सुरूवात होताच लोक शिमल्याचा स्नोफॉल बघण्याचं प्लानिंग सुरू करतात. या मोसमात शिमल्याचा तोट्यातला पर्यटन व्यवसाय पुन्हा व्यवस्थित सुरू होतो. दुसऱ्या बाजूला शिमल्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या एकाएकी वाढली आहे. तुम्हीही शिमल्याला जायचं ठरवत असाल तर तुमची विशलिस्ट थोडी मोठी करा. कारण तिथे तुम्हाला गर्दी मिळू शकते.

पण शिमल्याप्रमाणेच सुंदर आणखी एक जागा आहे, उटी हे असं सुंदर शहर आहे जे कपल्सचं फेवरेट हॅनीमून डेस्टिनेशन आहे. चला तर मग जाणून घेऊया, काय विशेष आहे या उटीमध्ये.

हे दक्षिण भारतातील प्रमुख हिल स्टेशन आहे. हे ठिकाण हनिमून हॉटस्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्याचा एक भाग आहे. उटी शहराच्या भोवताली असणाऱ्या निलगिरी पर्वतामुळे शहरातल्या सौंदर्यात भर पडते. या पर्वतांना ब्ल्यू माऊंटन म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की भोवतालच्या घाटांमध्ये फुलणाऱ्या निलगिरी फुलांमुळेच या ठिकाणाचं नाव कुरूंजी असं पडलं. ही फुलं निळ्या रंगांची असतात. त्यामुळे पर्वतही निळे दिसू लागतात.

विशेष काय

बोटॅनिकल गार्डन, डोडाबेट्टा उद्यान, उटी झिल, कलहट्टी, प्रपात आणि फ्लॉवर शो अशा बऱ्याच कारणांसाठी उटी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. एवलेंच, ग्लेंमोर्गनचे शांत, सुंदर गाव, मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान अशी काही प्रमुख पर्यटन स्थळं आहेत.

कसं पोहोचाल?

उटीजवळ ८९ कि.मी.वर कोइंबतूर विमानतळ आहे. मुंबई, कोलकात्ता, चेन्नई आणि मदुराईसाठी इथे नियमित विमानं आहेत. चेन्नई आणि कोइंबतूरहून ट्रेनसुद्धा आहे. बस-टॅक्सीने मदुराई, तिरूअनंतपुरम, रामेश्वरम, कोच्ची कोइंबतूरहून इथे पोहोचता येतं.

तुम्हालाही तुमच्या पार्टनरसोबत एखाद्या खास ठिकाणी फिरायला जायचं असेल तर हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

असे ठेवा, किटाणूमुक्त घर

* सोमा

‘स्वच्छ घरातच सुदृढ कुटुंब नांदते’ असे म्हटले जाते. हे बरोबरदेखील आहे. ऋतु कोणताही असो, प्रत्येकाने घर किटाणूमुक्त ठेवणे गरजेचे आहे. कारण याचा प्रभाव थेट आपल्या स्वास्थ्यावर पडतो. केवळ एखाद्या विशेष प्रसंगी नाही तर प्रत्येक दिवशी साफ-सफाई करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अनेक आजार जसे की श्वाससंबंधी, किटकांमुळे पसरणारे आजार, वायरल फ्लू इत्यादींपासून दूर राहू शकता.

जर घरात लहान मुले आणि वृद्ध असतील तर घर किटाणूरहीत असणे गरजेचे आहे.

मुंबईतील सॅरिनिटी पीसफुल लिव्हिंगचे डिझायनर आणि को फाऊंडर अमृत बोरकाकुटी सांगतात की जर्म फ्री घर असणे खूप गरजेचे आहे. कारण आजकाल अनेक प्रकारचे व्हायरल आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. ज्यामुळे अनेक प्रकारचे व्हायरल फ्लू होतात. यावर योग्यवेळी उपचार न झाल्यास ते जीवघेणे सिद्ध होऊ शकतात.

या काही टीप्सवर लक्ष द्या, ज्यामुळे तुम्ही किटाणूमुक्त घर ठेवू शकता :

* घराची नियमितपणे साफ सफाई करा. जेणेकरून घर पूर्णत: जर्म फ्री होईल. पुसणी किंवा डसटिंगसाठी अरोमा आणि युक्लिप्टस ऑइलचा वापर करा. यामुळे बॅक्टेरियाला निर्मितीची शक्यता उरणार नाही. तसेच यामुळे छोटे छोटे किडे नष्ट होतात.

* सफाई केल्यानंतर तो कपडा चांगल्या पद्धतीने साबणाने धुवून ऊन्हात वाळत घाला. यामुळे पुसणी किंवा डस्टिंग कापड साफ आणि दुर्गंध विरहित राहील.

* स्वंयंपाकघर आणि इतर खोल्यांसाठी वेगेवगळे डस्टिंगचे कापड ठेवा. यामुळे घर हायजिनिक राहील. पुसताना फ्लोर क्लिनर लिक्डिचा वापर नक्की करा. सर्वाधिक किटाणू हे जमिनीवरच आढळतात.

* किचन घरातील विशेष हिस्सा असतो. जिथे जंतू किटाणू सहजपणे प्रवेश करतात. वापरलेली भांडी वेळच्या वेळी धुवा. जर तुमची भांडी दुसऱ्या दिवशी कामवाली धुवत असेल तर सर्व भांडी डिर्टजंटच्या पाण्यात भिजवून ठेवा. अशा भांड्यांकडे किडे लवकर आकर्षित होतात.

* जिथे अधिक ओलावा असतो, तिथे बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर जंतू सहजपणे उद्भवतात आणि दुसऱ्या ठिकाणी पसरू लागतात. अशावेळी या जागेतून ओलावा दूर करण्यासाठी तो भाग धुवून झाल्यानंतर पंखा लावून ठेवा.

* चादरी आणि टॉवेल गरम पाण्यात आणि डिर्टजंटमध्ये नियमितपणे धुवा. जेणेकरून जर्म फ्री राहील.

* पडदे आणि पंख्यांची सफाई वॅक्युम क्लिरनने महिन्यातून एकदा तरी नक्की करा. बऱ्याचदा या ठिकाणी धूळ, माती सहजपणे जमते. मग किटाणू सहजपणे आकर्षित होतात.

* कोणत्याही भांड्यात किंवा डब्यात पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नका. यामुळे मच्छर आणि किटाणू उद्भवतात. १-२ दिवसात पाण्याचा उपयोग करून पुन्हा स्वच्छ पाणी भरा.

* जर घरात लहान मुले किंवा वृद्ध असतील तर जास्त काळजी घेणे आवश्यक असते, कारण कोणताही आजार त्यांना लवकर होतो. साफसफाईनंतर अरोमायुक्त कँडल किंवा अगरबत्ती नक्की लावा.

* बाथरूम आणि वॉश बेसिनची सफाई नियमितपणे करा. यासाठी ब्लीचच्या ऐवजी साबण आणि पाणी वापरणे योग्य राहील.

* टाईल्सची स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही डिटर्जंट आणि पाण्याचा वापर करू शकता. जर कुठे अधिक मळ जमा झाला आसेल तर त्याला जुना ब्रश आणि साबणाच्या सहाय्याने घालून स्वच्छ करा.

* दरवाजे खिडक्या आठवड्यातून एकदा साबणाच्या पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून काढा. जेणेकरून त्यावर धुळ, माती चिकटू नये आणि किटाणू आकर्षित होऊ नयेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें