‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने ‘ही अनोखी गाठ’मधील ‘मी रानभर’ प्रेमगीत प्रदर्शित झी

 * नम्रता पवार

स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. ‘मी रानभर’ असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले असून बेला शेंडेचा या प्रेमगीताला सुमधूर आवाज लाभला आहे. तर हितेश मोडक यांचीही या गाण्यासाठी साथ लाभली आहे. हितेश मोडक यांचेच संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांचे बोल लाभले आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिचे बहारदार नृत्य पाहाण्याची संधी प्रेक्षकांना या गाण्यातून मिळणार आहे.

या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, ” प्रेमदिनाच्या निमित्ताने हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या गाण्यात अधिक रंगत येत आहे. नवीन नात्याची सुरूवात या गाण्यातून दिसत आहे. हे नाते कसे बहरतेय, याचे सुंदर चित्रण यातून सादर होत आहे.’’ झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” अनोखी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात हे गाणे अतिशय चपखल बसत आहे. प्रेमाच्या तरल, हळुवार भावना यातून व्यक्त होत आहेत. श्रवणीय असे हे गाणे प्रेमीयुगुलांना नक्कीच आवडेल.’’

दरम्यान, १ मार्च रोजी ‘ही अनोखी गाठ’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

‘लग्नकल्लोळ’ चे दुसरे गाणे प्रदर्शित

* नम्रता पवार

मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या लग्नाचा कल्लोळ प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटातील ‘झणझणल्या काळजा वरती’ हे झणझणीत गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे धमाकेदार गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे. तर जय अत्रे यांचे जबरदस्त बोल लाभलेल्या या गाण्याला प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रिन्स याने केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=9UP8xOZSyF8

सिद्धार्थ जाधवचा एक वेगळाच लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या गाण्यातून याच्या काळजातील मयुरीविषयीची भावना, प्रेम तो व्यक्त करत आहे. हे जबरदस्त गीत ऐकायला जितके मस्त वाटते तितकेच पाहायलाही कमाल आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर ‘लग्नकल्लोळ’चे दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॅा. मयुर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे यांनी केले आहे. जितेंद्रकुमार परमार लिखित हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या गाण्याबद्दल डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, ‘’ अतिशय एनर्जेटिक असे हे गाणे आहे. सिद्धार्थ जाधव, आदर्श शिंदे ही जोडी एकत्र आल्याने या गाण्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यात या गाण्याच्या शब्दांनी आणि संगीताने अधिकच भर टाकली आहे. सिद्घार्थ आणि मयुरीची अफलातून केमिस्ट्री या गाण्यातून दिसत आहे. मला आशा आहे, पहिल्या गाण्याप्रमाणेच हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

‘‘सण कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो’’ – सीमा कुलकर्णी

* सोमा घोष

आकर्षक उंची, मृदुभाषी २७ वर्षीय मराठी अभिनेत्री सीमा कुलकर्णी ही महाराष्ट्रातील उस्मानाबादमधील तुळजापुरातली आहे. तिने मराठी चित्रपट, वेब सीरिज आणि अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये तिने ‘शिनमा येडा’ या चित्रपटातून या क्षेत्रातील प्रवास सुरू केला. त्यानंतर तिने अनेक वेब मालिका, चित्रपट आणि टीव्हीवरील मालिकांमध्ये काम केले. ‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

सीमा खऱ्या आयुष्यात फारशी संयमी नसली तरी अभिनयात मात्र ती प्रचंड संयम बाळगते. फिल्मी भाषेत सांगायचे तर तिला ‘अँक्शन’ आणि ‘कट’मध्ये जगायला खूप आवडते. तिच्या मते अभिनय क्षेत्र कधीच सोपे नसते. एका दृश्यासाठी तिने सुमारे ८ ते १० रिटेक दिलेत, जे तिला एका मोठया अभिनेत्यासोबत अभिनय करताना द्यावे लागले होते. मराठीशिवाय तिने हिंदी आणि मल्याळम मालिकांमध्येही काम केले आहे. सीमा तिच्या यशाचे श्रेय तिची आई शीतल कुलकर्णी आणि वडील विकास कुलकर्णी यांना देते. सन मराठी वाहिनीवर तिची ‘सावली होईन सुखाची’ ही मालिका सुरू आहे. यात ती गौरीच्या मुख्य भूमिकेत आहे.

ही मालिका करतानाचा तुझा अनुभव कसा आहे? ती तुझ्या वास्तविक जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

यामध्ये माझी भूमिका एका खेडयातील मुलीची आहे, जिला कुटुंबातील सर्व नातेसंबंध खूप आवडतात, परंतु तिच्या आई-वडिलांची इच्छा असते की तिने एका वृद्धाशी लग्न करावे, त्यामुळे गौरी पळून जाते आणि शहरात येते. तिथे घरकाम करू लागते. त्यादरम्यान, तिला एक ६ वर्षांची मुलगी भेटते, जिच्यावर ती आईसारखे प्रेम करते. दोघींमध्ये आई-मुलीचे नाते फुलते. हे खूपच भावनिक वळण आहे आणि मला ते करताना खूप मजा येत आहे.

वास्तविक जीवनात मला प्रत्येक नाते आणि कुटुंब खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे मालिकेतील नातेसंबंध माझ्या प्रत्यक्ष आयुष्याशी मिळतेजुळते आहे, पण ही मालिका असल्याने यात नाट्य थोडे अधिक आहे. याशिवाय आपल्या समस्यांशी कसे लढायचे हे मला माहीत आहे, पण मालिकेतील गौरीला ते समजायला आणखी काही वेळ लागेल. सुरुवातीला आईची भूमिका साकारणे अवघड वाटत होते. विशेषत: लहान मुलीसोबत अभिनय करणे अवघड आहे, कारण मुले मुडी असतात, पण ही मुलगी लहान असूनही चांगले काम करत आहे.

तुला किती तयारी करावी लागली?

मी त्या मुलीची आई आणि माझ्या आईचे वागणे पाहिले आणि तसे वागण्याचा प्रयत्न केला.

तुला अभिनयात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

लहानपणापासून टीव्हीवर चित्रपट आणि मालिका पाहून मी अभिनय करण्याचा विचार करत होते. तेव्हा मला नायिका व्हायचे होते. मला त्यावेळी अभिनेत्री आणि नायिकेतील फरक समजत नव्हता. मला नृत्याची आवड होती. माझे लहानसे शहर तुळजापूरमध्ये कोणालाच अभिनयाविषयी माहिती नव्हती आणि या क्षेत्रातील एकही कलाकार तिथला नव्हता, त्यामुळेच माझी इच्छा ऐकून सर्व माझ्यावर हसायचे. माझ्यावर माधुरी दीक्षित आणि मुक्ता बर्वेच्या कामाचा खूप प्रभाव होता. त्यांचे चित्रपट पाहिल्यानंतर मी त्याच जगात जगायचं, तेव्हाच मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

तुला कुटुंबाकडून किती पाठिंबा मिळाला?

सुरुवातीला या क्षेत्राबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्यावेळी सोशल मीडियाची फारशी क्रेझही नव्हती. मी नृत्याची सुरुवात व्हिडीओ पाहून गणपती उत्सवात नृत्याच्या पथकात सहभागी होऊन केली. तुळजापुरात नृत्याचे वर्ग नव्हते. जेव्हा मी थोडी मोठी झाले तेव्हा आजूबाजूचे लोक नाचणे चुकीचे आहे असे म्हणू लागले. त्यामुळे घरचे वैतागले आणि त्यांनी मला नृत्य करण्यास नकार दिला. मी ठरवले की मला इथे राहायचे नाही. त्याच दरम्यान पुण्याच्या जवळपासहून एक दिग्दर्शक आला आणि त्याने स्थानिक चित्रपट बनवण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने स्थानिक कलाकारांना घेतले. आधी चित्रीकरण सुरू केले, पण त्यानंतर त्याने अचानक चित्रीकरण थांबवून आर्टिस्ट कार्ड बनवण्यासाठी पैसे मागायला सुरुवात केली. मी आईला येऊन सर्व सांगितले आणि २०१२ मध्ये मी त्याला आर्टिस्ट कार्डसाठी २५ हजार रुपयेही दिले. वडिलांना न सांगता आईने सर्व पैशांची व्यवस्था केली होती. त्या लोकांनी आमची मेहनत पाहून तो चित्रपट स्थानिक पातळीवर गावातील दोन चित्रपटगृहांत प्रदर्शित केला. सर्व कलाकारांचे सर्व पैसे वाया गेले, कारण गावातील कोणालाच अभिनय क्षेत्राची माहिती नव्हती. नंतर समजले की ते सर्व फसवणूक करणारे होते. माझ्या वडिलांनी तो चित्रपट पाहिला होता आणि त्यांनी मला पुढील कामासाठी पुण्याला पाठवले. तोपर्यंत सोशल मीडिया थोडा सक्रिय झाला होता. त्यामार्फत मी अनेक ठिकाणी माझे फोटो पाठवले, पण सर्वांनी मुंबई आणि पुण्याला यायला सांगितले.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

पुण्यात आल्यावर मी मास मीडियाचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि थिएटरमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. तिथेही मला खूप चुकीचे लोक भेटले. मुंबईत आल्यानंतर मला या इंडस्ट्रीबद्दल खूप काही समजले. पहिला ब्रेक मिळणे सोपे नव्हते, पण पुण्यात असताना मी ‘मॅरेथॉन जिंदगी’ हा चित्रपट केला होता, ज्यात विक्रम गोखले आणि संजय नार्वेकर यांच्यासारखे मोठे कलाकार होते. तो माझा पहिला ब्रेक होता, पण मला त्यातून फारसा फायदा झाला नाही. मी पुण्यातून मुंबईला आले आणि छोटया भूमिका करू लागले. २०१८ मध्ये मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील काही भागांत काम केले. त्यानंतर ‘गुलमोहर’, ‘आणीबाणी’ ‘मेकअप’ आदी चित्रपटांत काम केले. एका रियालिटी शोमध्येही पहिल्या ६ मध्ये पोहोचले होते.

तुला किती संघर्ष करावा लागला?

कुठल्याही कलाकाराचा संघर्ष सुरूच असतो. आधी काम मिळवण्यासाठी, नंतर ते टिकवण्यासाठी आणि भविष्यात चांगले काम करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.

कोणत्या मालिकेने तुझे आयुष्य बदलले?

‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबसीरिज मी केली होती, ज्याने मला ओळख मिळवून दिली, सर्वांनी माझ्या भूमिकेचे कौतुक केले. थोडी टीकाही झली, कारण त्यात मी काही बोल्ड सीन दिले होते. एका दृश्यात मी बिकिनी घालून आले होते, पण त्या कथेत ते दृश्य आवश्यक होते.

इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्य तू किती सहजतेने करू शकतेस?

कथेच्या मागणीनुसार मी कोणतीही भूमिका करण्यास मागेपुढे पाहात नाही. मला असा एक चित्रपट मिळाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री फक्त बिकिनीमध्ये दिसणार होती, मात्र त्याचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता, त्यामूळे मी नकार दिला.

हिंदी चित्रपटसृष्टीत तुला काम करण्याची इच्छा आहे का?

अर्थातच. मला मराठीच नाही तर प्रत्येक भाषेतील वेगवेगळया चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. मला विकी कौशल आणि ऋतिक रोशन यांच्यासोबत काम करायचे आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याचीही माझा इच्छा आहे.

तू उस्मानाबादची आहेस, तिथे काय काम करायची तुझी इच्छा आहे?

मला तिथल्या लोकांना अभिनयाची माहिती द्यायची आहे. होय, कारण तिथे या क्षेत्राबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. छोटया शहरातील असूनही तेथील अनेकांमध्ये खूप प्रतिभा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी प्रसंगानुरुप फॅशन करते. कुठलाही ट्रेंड पाहून फॅशन करत नाही तर मला जे शोभेल तेच घालते.

मला खायला खूप आवडते. आईने बनवलेली डाळ ढोकळी खूप आवडते.

तू सण कसे साजरी करतेस?

सण कुठलाही असो, मला तो कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो.

तुला नवोदितांना काही संदेश द्यायचा आहे का?

तुमच्या कामावर प्रेम करा, मेहनत, समर्पण आणि संयम ठेवा, तरच तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.

आवडता रंग – पांढरा.

आवडता पोशाख – भारतीय साडी.

आवडते पुस्तक – कोसला कादंबरी.

आवडता परफ्यूम – टायटनचा कोणताही.

आवडते पर्यटन स्थळ – उटी.

वेळ मिळाल्यास – पुस्तकं वाचणे आणि वेब सिरीज पाहाणे.

जीवनातील आदर्श – प्रत्येकाला आदर देणे.

सामाजिक कार्य – प्राण्यांसाठी काम करणे.

स्वप्नातील राजकुमार – काम आणि कुटुंबाचा आदर करणारा.

जीवन जगण्याचा मंत्र – कृतज्ञत, कृज्ञत राहाणे.

नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी नेहमीच निरनिराळ्या विषयांच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आता आपल्या मनोरंजनाच्या पेटाऱ्यातून आणखी एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. “निवेदिता माझी ताई” असे या मालिकेचे नाव असून या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अशोक आणि एताशा यांनी याआधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. आता नव्या मालिकेतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन कशा प्रकारे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. यशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. पण या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहानगा मुलगा दिसणार आहे. रुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो असीम या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. असीम हा निवेदिताचा लहान भाऊ. आता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणते, हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.

सोनी मराठी वाहिनी नेहमीच रंगतदार विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येते. “निवेदिता माझी ताई” या मालिकेचा विषयही तितकाच आगळावेगळा आहे. अभिनेता अशोक फळदेसाई आपल्या प्रॉमिसिंग अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल. तसेच एताशा संझगिरीनेही याआधी काही मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे आणि आता या मालिकेत दोघेही नव्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतील. मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निवेदिता आणि यशोधन  यांच्या नव्या वेषभूषेची चर्चा नक्कीच रंगणार आहे. भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता असीम आणि निवेदिता या भावा-बहिणीचे अनोखे नाते कशाप्रकरचे असेल हे मालिकेतच आपल्याला पाहायला मिळेल. मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर दाखल होणार आहे. पाहायला विसरू नका “निवेदिता माझी ताई” लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट सलमान सोसाइटी चा ट्रेलर लॉन्च

* सोमा घोष

सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटिला आली आणि ती लोकांच्या पसंतीत उतरलीत. आज चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे.

ट्रेलर मध्ये खुप इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीचीही किनार आहे. हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांवर भाष्य करतो. एकुन हा चित्रपट शिक्षणवर भाष्य करतो. ट्रेलरमध्ये लहानग्यांची शिक्षणासाठीची धड़पड़ लक्ष वेधुन घेते.

दिग्दर्शक कैलाश पावर आणि निर्मात्यांनी प्रयत्न केला आहे की हया भटक्या, अनाथ मूलांची व्यथा सर्वाना समोर यावी आणि हयावर प्रबोधन होऊनी मुलांना योग्य ते शिक्षण मिळावे.

अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे . ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यानि दिले असुन डीओपी फारूक खान आहेत. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

प्रजक्ता एंटरप्राइजेस निर्मित, अवंतिका  दत्तात्रय पाटील आणि विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होत असुन म्यूजिक वीडियो पॅलेसवर उपलब्ध आहे.

‘‘महिलांनी नेहमीच विचारांवर ठाम राहावे’’ – अश्विनी कासार

* सोमा घोष द्य

सावळया रंगाची, रेखीव आणि कमनीय बांध्याची ३१ वर्षीय मराठी अभिनेत्री अश्विनी कासार मुंबईची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. वकिलीची इंटर्नशिप करत असताना तिला अभिनयाची संधी मिळाली आणि पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली. तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यांचा तिला नेहमीच पाठिंबा मिळाला. अश्विनीने २०१४ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. तिची पहिली मराठी मालिका ‘कमला’ होती, ज्यामध्ये तिने कमलाची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली आणि तिने अनेक पुरस्कारही मिळवले. त्यांनतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. अश्विनी ‘गृहशोभिका’ वाचते आणि यात प्रसिद्ध झालेले लेख तसेच कथा तिला मोठया प्रमाणावर प्रेरित करतात.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्यापासूनच अश्विनी सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय होती, तिने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती भरतनाट्यम् नृत्यांगनाही आहे. सोनी टीव्ही मराठीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत ती एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जी तिला तिच्या प्रत्यक्ष आयुष्याशी खूपच मिळतीजुळती वाटते. चला, तिच्या या प्रवासाबद्दल तिच्याकडूनच जाणून घेऊया.

या मालिकेत तुझी भूमिका काय आहे? ही मालिका तुझ्या वास्तविक आयुष्याशी किती मिळतीजुळती आहे?

मी अनुजा हवालदारच्या भूमिकेशी शारीरिक बनावटीच्या रूपात खूपच मिळतीजुळती आहे. जेव्हा मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला पाहाते तेव्हा त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्टया सुदृढ राहाण्यासोबतच एक ठराविक ध्येय असल्याचेही पाहाते. त्यांचे ध्येय त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ते नेहमीच काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या सुदृढ शरीरातून त्यांची चपळता झळकते. मला वाचायला आणि लोकांसाठी काहीतरी करायला आवडते. याशिवाय, मी फिटनेस प्रेमी आहे आणि नेहमीच स्वत:ला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करते. दररोज व्यायामासाठी वेळ काढते, कारण दैनंदिन जीवनात व्यायाम गरजेचा असतो. माझी प्रशिक्षक सिद्धी ढगे नसेल तर मी धावायला किंवा चालायला जाते.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातले नाही, मी वकील आहे आणि ६ महिन्यांपासून प्रॅक्टिस करत होते. तेव्हा मला वाटले की, मी या क्षेत्रासाठी बनलेले नाही, कारण मी महाविद्यालयात असताना नृत्य आणि नाटक करायचे. मी भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. माझी एकंदरीत आवड अभिनयात होती, माझे करिअर काय असेल हे मला माहीत नव्हते. याबद्दल मी माझ्या आईवडिलांशी बोलले, त्यांनी खूपच पाठिंबा दिला. मी माझ्या आवडत्या क्षेत्रात करिअर करावे, असा सल्ला दिला. मी पुन्हा पुन्हा ऑडिशनला जाऊनही मला काम मिळत नव्हते आणि तरीही त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून आणि शिक्षणातून मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळाली.

तुला कुटुंबाचे सहकार्य कसे मिळाले?

माझे कुटुंब उच्च शिक्षित आहे, मी १५ सदस्यांसह एकत्र कुटुंबात राहाते. माझे आईवडील तसेच कुटुंबातील इतर मला नेहमीच पाठिंबा देतात. मला कधी, कोणीही रोखले नाही. माझ्या मते कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, कारण यश मिळाले, पण कुटुंब नाराज असेल तर त्या यशाला अर्थ उरत नाही. हे क्षेत्र अतिशय अनिश्चित असल्याने ते माझ्यासाठी थोडे चिंतेत असायचे. माझे वडील डॉ. उल्हास कासार शास्त्रज्ञ होते. आईचे नाव सीमा कासार असून बहीण डॉ. शरयू कासार शास्त्रज्ञ तर भाऊ मानस कासार दंतवैद्य आहे.

तुला पहिला ब्रेक कसा आणि कधी मिळाला?

मी उच्च न्यायालयात एका खटल्यासाठी काम करत होते. त्याचवेळी मला ‘कमला’ या मालिकेसाठी एका प्रॉडक्शन हाऊसमधून फोन आला. मी मुख्य भूमिकेत होते. ही मालिका विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध नाटकावर आधारित होती. फेसबुकवर माझा फोटो पाहिल्यानंतर मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते, पण तेव्हा मी माझ्या वकिलीच्या कामात व्यस्त होते आणि मला ऑडिशनला जायची इच्छा नव्हती. त्यांनी मला दुसऱ्यांदा  बोलावल्यावर मी गेले आणि माझी निवडही झाली. अनेकदा ऑडिशन दिल्यानंतर मला काम मिळाले. या क्षेत्रातील घराणेशाही मला कधीच समजली नाही आणि मी मराठी इंडस्ट्रीत माझ्यासमोर ती कधी पाहिलीही नाही, कारण मी नेहमीच स्वत:साठी स्वत: संघर्ष केला आहे.

तू संघर्ष किती केला?

मी माझ्या कुटुंबासह महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये राहाते आणि तेथूनच मला कामासाठी दूरवरचा प्रवास करावा लागतो. केवळ एक मालिका मिळून फारसा फरक पडणार नव्हता, कारण मला सिद्ध करून दाखवायचे होते की, मी एक चांगली अभिनेत्री आहे आणि त्यासाठी मला आणखी कामाची गरज होती. खरंतर कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळया भूमिका साकारण्यासाठीचा संघर्ष मोठा असतो. मी पहिल्या मालिकेत ‘कमला’ या आदिवासी मुलीची भूमिका साकारली. एका सत्य घटनेवर आधारित ही मालिका होती. अशा प्रकारे पहिल्या मालिकेत मी एक अशिक्षित मुलगी दुसऱ्यामध्ये शिक्षण घेतलेली पहिली मुलगी आणि आता आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. पहिली मालिका ‘कमला’मधूनच मला ओळख मिळाली.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचे आहे आणि ऑडिशनही द्यायचे आहे. हिंदी चित्रपटांमध्ये अंतर्गत दृश्यांची मागणी असेल तर त्यासाठी माझी काहीच हरकत नाही.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

औचित्य पाहून मी फॅशन करते. याशिवाय मी काहीही छान घालू शकते. मी खवय्यी आहे आणि माझी आई खूप छान स्वयंपाक करते. मी साधे जेवण बनवू शकते.

उन्हाळयात तुझ्या त्वचेची काळजी तू कशी घेतेस?

मी बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन लावते. केसांच्या संरक्षणासाठी स्कार्फ घालते, त्यामुळे उन्हाळयात केसांचे उन्हापासून संरक्षण होते. उन्हाळयात हायड्रेट राहाणे आवश्यक असते, त्यासाठी मी लिंबू पाणी, कोकम सरबत इ. पीत राहाते.

सत्ता हाती आल्यास तू काय बदलू इच्छितेस?

मला सर्वांची विचारसरणी बदलायची आहे. होय, कारण ती कुटुंब, समाज आणि देश बदलू शकते आणि त्यामुळेच देश पुढे जातो.

तुला काही संदेश द्यायचा आहे का?

माझा संदेश असा आहे की, महिलांनी नेहमी त्यांच्या विचारांवर ठाम राहावे. जे काही काम त्यांना स्वत:साठी करायचे असेल ते त्यांनी करावे आणि त्यातूनच पुढे जावे.

आवडता रंग – जांभळा.

आवडता पोशाख – साडी.

आवडते पुस्तक – मृत्युंजय.

आवडता परफ्युम – वर्सासे.

आवडते पर्यटनस्थळ – जपान, केरळ.

वेळ मिळाल्यास – झोप, खाणे, वाचन.

जीवनातील आदर्श – स्वत:शी प्रामाणिक राहाणे.

सामाजिक कार्य – अनाथ मुलींसाठी काहीतरी करायचंय.

स्वप्नातील राजकुमार – वाचन, फिरण्याची आवड आणि महिलांचा आदर करणारा.

जीवन जगण्याचा मंत्र – काम करा आणि समाधानी राहा.

निखिल भांबरीचा फिटनेस फंडा !

* सोमा घोष

निखिल भांबरी हा भारतीय मनोरंजन उद्योगातील एक अनोखा अभिनेता आहे. नामवंत कलाकारांसोबत त्यांनी अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केले आहे आणि स्वतःचे नाव कमावले आहे. पण एवढ्या व्यस्त वेळापत्रकात तो फिटनेस कसा राखतो? त्याने अलीकडेच स्क्रिप्ट हातात घेतलेला एक फोटो पोस्ट केला आहे आणि यातून तो लवकरच काहीतरी नवीन करणार असल्याच कळतंय. निखिल भांबरी एक हटके वर्कआउट रूटीन करतो तो घरामध्ये किंवा जिममध्ये करता फिटनेस रूटीन फॉलो करतो. त्याला खाण्याची आवड असूनही तो तळलेले पदार्थ जास्त मीठ साखर लोणी किंवा तेल टाळून जागरूक आहार ठेवतो. निखिल त्याच्या फिटनेसबद्दल जागरूक राहून नेहमीच फिटनेस फंडा जपतो.

‘सन मराठी’ घेऊन येत आहे नवीन मालिका कथा ‘सावली होईन सुखाची’

* सोमा घोष

कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला मालिकेचा ग्रँड प्रिमिअर सोहळा.

‘सन टीव्ही नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीने नेहमीप्रमाणे यावेळीदेखील एका नाजूक विषयात हात घातला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणारी ‘सन मराठी’ एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या माध्यमातून येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता घेऊन येत आहे.

प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात नाही ते आपसूक होऊन जातं. ‘सन मराठी’ वाहिनी ‘सावली होईन सुखाची’ ही नवीन मालिका घेऊन येत आहे, ज्यामध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची देखील गोष्ट दाखवण्यात आली आहे.

ही गोष्ट आहे श्रीमंत कुटुंबाची, कुटुंब आर्थिकदृष्ट्या कितीही परिपूर्ण असलं तरी घरातील सदस्यांना एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, माया काही वाटत नाही. जणू त्या घराने कधी प्रेम हे पाहिलंच नसावं. तसेच त्या श्रीमंत घराण्यातील एक सदस्य जो भूतकाळातील एका घटनेमुळे वाईट सवयींच्या आहारी गेला आहे, त्याच्यामुळे घरात सकारात्मक असं वातावरण नाही. पण त्याच घरात एक मोलकरीण आणि एक अनाथ मुलगी यांचा प्रेमळ स्वभाव देखील वावरतोय. कदाचित त्या दोघींच्या मनमिळावू स्वभावामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकतीच या मालिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला

मिळाली आणि प्रोमोमध्ये मालिकेचा नायक रोनक शिंदे ज्याला वाईट सवयी लागल्या आहेत आणि घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहेत आणि मालिकेची नायिका सीमा कुलकर्णी जी मोलकरणीच्या भूमिकेत दिसली आहे, त्यांच्यातील अबोल भावना पाहायला मिळाल्या. एखाद्यावर ठरवून प्रेम केलं जात नाही, ते आपसूक होतं, असंच काहीसं त्यांचं नातं आहे. त्या दोघांना एकमेकांची सोबत मिळेल का, हे लवकरच कळेल.

नुकताच, ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचा ग्रँड प्रिमिअर सोहळा, मालिकेचे प्रमुख कलाकार रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पार पडला. मालिकेला मोठं करणारे हे मायबाप रसिक प्रेक्षकच असतात म्हणून खास त्यांच्यासाठी मालिकेच्या टीमने मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या उपस्थितीत पाहिला आणि प्रेक्षकांनी देखील त्याचा आनंद लुटला आणि मालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

रोनक शिंदे, सीमा कुलकर्णी यांच्यासह आरंभी उबाळे, रुतविज कुलकर्णी, धनंजय वाबळे, सुप्रिया विनोद, एकनाथ गिते, नैना सामंत, यश पेडणेकर, ज्ञानेश्वरी देशपांडे, अवनिश आस्तेकर, श्वेता मांडे, निशा कथावते, निलेश गावरे, पूनम चव्हाण, सलमान तांबोळी आणि आशिष चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रतिश तगडे, पदमनाभ राणे आणि महेश बेंडे निर्मित, निशांत सुर्वे दिग्दर्शित ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेची कथा-पटकथा महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिले असून विशाल कदम यांनी संवाद लिहिले आहेत. मालिकेची झलक पाहिल्यावर प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडला असेल की घरची मोलकरीण, होईल का साता जन्माची सोबतीण? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा नवी मालिका ‘सावली होईन सुखाची’ १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

स्त्रियांबद्दलच्या अनोख्या दृष्टीकोनात भूमिका साकारणारी अभिनेत्री !

* सोमा घोष

मनोरंजन उद्योग वेगवेगळ्या कथांना न्याय देऊन त्या उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री म्हणजे रिताभरी ! तिच्या चित्रपटांमधील सशक्त भूमिकासाठी ती नेहमीच चर्चेत असते. स्वतंत्र महिलांच्या सशक्त चित्रणातून स्टिरियोटाइप मोडतात. तिच्या आकर्षक कामगिरीने तिने केवळ प्रेक्षकांनाच भुरळ घातली नाही तर अनोख्या भूमिका साकारून नेहमीच सगळ्यांना प्रेरित केल.

रिताभरी चक्रवर्ती हिने साकारलेली फुलोरा भादुरी ही कथा सगळ्यांच्या पसंतीस पडली. फुलोराची फॅशन आवड आणि अपवादात्मक डिझाइनिंग कौशल्ये तिच्या स्वप्नांना चालना देतात.

तिने नंदिनी नावाचा तिचा आणखी एक प्रोजेक्ट नुकताच पूर्ण केला. सायंतानी पुतटुंडाच्या पुस्तकातून रुपांतरित केलेल्या “नंदिनी” या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा, आपल्या मुलीला वाचवण्याचा आईचा अविचल दृढनिश्चय दर्शवते. ही मालिका स्त्री भ्रूणहत्येसारख्या पितृसत्ताक नियमांना आव्हान देते, चक्रवर्तीच्या सशक्त स्त्री पात्रांच्या प्रभावशाली चित्रणात भर घालते.

रिताभरी हिने नेहमीच सशक्त स्त्री पात्रांचे प्रभावी चित्रण करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

“ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय

* सोमा घोष

अलीकडे लॉन्च करण्यात आलेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभल्याने आयुषमानच्या अंगात उत्साह सळसळललेला दिसतो.

त्याला त्याचे मित्र आणि कुटुंबियांकडून सतत कॉल आणि मेसेज येत असतात.

याविषयी बोलताना आयुषमान खुराना सांगतो, “ड्रीम गर्ल तर ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या भागामुळे आता सिक्वेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो. माझे चाहते मोठ्या पडद्यावर फिल्म पाहतात, तेव्हा त्यांचं भरपूर मनोरंजन होईल हे बघून समाधान वाटतं.”

तो पुढे सांगतो, “ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा प्रत्येकाला धमाल वाटतो, भरपूर हशा आणि पोटदुखेपर्यंत मनोरंजन करते. आम्ही वचन देतो की लोकांना एक अद्वितीय अनुभव मिळेल. मी सिनेमात साकारलेली पूजा लोकांच्या पसंतीस उतरली हे पाहून मला समाधान वाटत आहे! एखाद्या मुलीची वेषभूषा करून सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी मोठी जोखीम होती. माझा हा अवतार लोकांना आवडतो याचा मला खरोखर आनंद वाटतो. हे खूप फायद्याचे आहे. एखाद्याला हसवण्याची कामगिरी खूप मोठी असते. हा सिनेमा प्रेक्षकांना निराळा अनुभव देणारा आहे.”

दिनांक 25 ऑगस्ट रोजी ड्रीम गर्ल 2 चंदेरी पडद्यावर प्रदर्शित होईल आणि नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें