रीना मधुकर ‘मन उडू उडू झालं’साठी आहे उत्सुक!

* सोमा घोष

ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. एखादी व्यक्ती नेहमी ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली की तिची छबी तयार होते पण तिच व्यक्ती जर सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसली की तितकाच निरागसपणा किंवा सिंपलिसिटी त्या व्यक्तीमध्ये दिसून येते आणि त्यामुळे प्रेक्षकांवर त्याची जास्त भुरळ पडते. असंच काहीसं आहे अभिनेत्री रीना मधुकर उर्फ रीना अगरवाल हिच्या बाबतीत.

अभिनेत्री रीना मधुकरने आतापर्यंत तिचा सोशल मिडीया प्रेझेन्स अतिशय ग्लॅमरस ठेवला आहे जो तिच्या चाहत्यांनाही आवडतोय. पण अभिनय आणि कामाच्या बाबतीत तिने नेहमीच वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. जसे की ‘अजिंठा’ या मराठी सिनेमात तिने आदिवासी पात्राची भूमिका साकारली, तर ‘एजंट राघव- क्राईम ब्रांच’ हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये फॉरेसिंक डॉक्टरच्या भूमिकेत दिसली. इतकेच नव्हे तर ‘तलाश’ हिंदी सिनेमात पोलिसाचं पात्रं साकारलं आणि ‘३१ दिवस’ या मराठी सिनेमात अंध मुलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. थोडक्यात काय तर, रीना मधुकरने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत नाविन्य होतं. आता रीना झी मराठीवरील मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेत ती ‘सानिका देशपांडे’ची भूमिका साकारत आहे जी नायिका साकारत असेल्या हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहिण दाखवली आहे.

‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रीना म्हणते की, “‘मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे आणि फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृता दुर्गुळेचं काम मी पाहिलं होतं आणि मला आवडलेलं. हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना मजा येतेय. झी मराठी वाहिनी ही देखील माझ्यासाठी खास संधी आहे कारण या वाहिनीशी प्रत्येक मराठी कुटुंब जोडलं गेलं आहे. तसेच सेटवरील वातावरण अगदी हलकं-फुलकं, प्रसन्न आहे असं वाटतंय जणू वर्क फ्रॉम होमच चालू आहे इतक्या छान पद्धतीने सेटवर सर्वांचा वावर असतो.”

यापूर्वी रीनाने मराठी सिनेमांत काम केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये देखील रीनाने तिची स्वत:ची ओळख तयार केली आहे, त्यामुळे तिच्या या पहिल्या मराठी मालिकेला मराठी कलाकारांसह हिंदी कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या. ग्लॅमरस रीनाचा ऑनस्क्रिन नवा लूक आणि नवी भूमिका प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रिट ठरणार हे नक्की.

वैदेही आणि अंध साहिल यांची प्रेमकहाणी!

* सोमा घोष

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही  रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी राहते आणि आपल्या कुटुंबाची  जबाबदारी संभाळतेय.  वैदेहीची व्यक्तिरेखा सायली देवधर साकारते आहे.

साहिल अंध आहे, पण त्याला कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही.  वैदेहीचं फुलांचं दुकान जिथे आहे त्याच देवळात साहिल येत असतो.

वैदेही आणि साहिल यांची आधीची ओळख आहे, असं प्रेक्षकांना पहिल्या भागात पाहायला मिळालं. आता या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी  उत्सुकतेचं असणार आहे.

साहिल ही व्यक्तिरेखा अभिनेता अभिषेक रहाळकर साकारतोय. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दली आणि त्यांच्याकडून  बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. त्याचा अभ्यास त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत आणि अभ्यास या मालिकेत  पाहायला मिळेल. मराठी मालिका विश्वात अशी आगळीवेगळी प्रेमकहाणी  प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.

पाहा, ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते, सोम. -शनि.,  संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

मराठी चित्रपटसृष्टिचं भविष्य उज्ज्वल आहे – वीणा जामकर

– सोमा घोष

मराठी नाटय आणि चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख बनविणारी मराठी अभिनेत्री वीणा जामकरचा जन्म मुंबईजवळच्या पनवेल आणि पालनपोषण रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात झालं. तिचं कौटुंबिक वातावरण कला आणि संस्कृतीचं राहिलंय, या कारणामुळेच तिने शाळा आणि महाविद्यालयातून नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अविष्कार नाटयसंस्थेत प्रवेश घेतला आणि मराठी चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला लागली, तिला नाटकांबरोबरच चित्रपट करण्याचीदेखील संधी मिळाली. हसमुख आणि विनम्र स्वभावाच्या वीणाचा प्रवास आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलणं झालं, सादर आहेत त्याचे काही खास अंश :

अभिनयात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा माझी आई अलका जामकरकडून मिळाली. शाळेत शिक्षक असली तरी तिलादेखील नाटकांची आवड होती. खरं म्हणजे महाराष्ट्रात कलेचं वातावरण आहे, त्यामुळे अनेक कुटुंब कला आणि संस्कृतिशी संबंधित असतात. मला आठवतंय की लहानपणी मी आईला उरणमध्ये छोटयाछोटया नाटकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मला अभिनयाची आवड आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने मला काही संवाद बोलायला सांगितले, जे मी अनाहुतपणे करून दाखवलं. बाबा सरकारी कर्मचारी होते, परंतु त्यांना पेंटिंग, कॅलिग्राफीची आवड होती. त्यांनी ९० च्या दशकात आम्हा दोघींना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, कारण त्याकाळी गावात काम करण्यासाठी माझी आई संकोचायची. माझ्या बाबांचे विचार खूप सुधारक होते. माझा भाऊ केमिकल इंजिनिअर आहे.

तुझ्या प्रवासात कुटुंबाने किती सहकार्य केलं?

मी वयाच्या १५व्या वर्षीच सांगून टाकलं होतं की मला अभिनयाची आवड आहे आणि मी शाळेच्या नाटकात सहभागी व्हायची. त्यावेळी माझा भाऊ मुंबईत शिकत होता आणि मलादेखील तिथे जाऊन शिकायचं होतं. अभिनय करण्यासाठी मुंबईत येऊन सर्वांना भेटता येणार होतं. मराठी साहित्यात पदवी घेतल्यानंतर मी नाटकातदेखील व्यस्त राहिली. मानसिक आधारदेखील खूप मिळाला, ज्यामुळे मला काम करताना मजा आली.

पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?

मुंबईची जुनी आणि प्रचलित नाटयसंस्था अविष्कार संस्थेत मी गेली आणि तिथे दिग्दर्शक राजेंद्र बडे त्यांचा पहिला चित्रपट बनवत होते. त्यावेळी मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांची रुची वाढत चाललेली. त्यादरम्यान मला दिग्दर्शकांनी कास्ट केलं आणि त्यामुळे मला चित्रपटात काम करण्याची पद्धत, कॅमेरा फेस करणं इत्यादी समजलं. थिएटरमध्ये काम करणं आणि चित्रपटात काम करणं खूप वेगळं आहे. दुसरा चित्रपट वळू होता, जो खूप चालला आणि आजदेखील तो चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना कसं वाटलं?

अजिबात आवडलं नव्हतं. नाटकात कोणी ना कोणी मागून बोलत असतं, वेळ ठरलेली असते, त्यामुळे मला अभिनय करताना आनंद मिळतो. एक लिंक बनते. चित्रपटात काम करताना वारंवार कट बोलणं, इमोशनचं मागेपुढे होणं छान नाही वाटतं. त्यामुळे मी बाबांनादेखील सांगून टाकलं की मी फक्त नाटकामध्ये कामे करेन. त्यांनी मला फोर्स न करता माझ्यावर सोडून दिलं. मी २०११ साली मी चित्रपट आणि नाटक दोन्हीमध्ये काम करत होती. त्यामुळे मला एकत्रित पैसे मिळत होते त्यामुळे मला मुंबईत राहण्याची वा खाण्यापिण्याची आबाळ होत नव्हती. माझं पॅशन नाटक होतं, परंतु नंतर मला चित्रपट आवडू लागले.

कोणत्या चित्रपटामुळे घरोघरी ओळख मिळाली?

कामाला सुरुवात ‘वळू’  चित्रपटाने झाली, परंतु २०१०साली मी महेश मांजरेकरचा ‘लालबाग परळ’ चित्रपट २०१० साली केला होता, जो मुंबईच्या मिल कामगारांवर बनविला गेला होता, त्यामध्ये माझी मंजुची भूमिका सर्वांना आवडली होती. त्यानंतर ‘कुटुंब’ चित्रपट आला आणि घरोघरी ओळख मिळाली.

मराठी चित्रपटसृष्टित काम करताना कसं वाटतं?

मराठी चित्रपटसृष्टित साहित्य, कलाकृती, कथा आणि कलाकार खूप छान आहेत, एवढी विविधता कुठे पहायला मिळत नाही. या इंड्रस्ट्रीत काम करून छान वाटतं. याव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टित स्टार सिस्टीम नाही, कारण हा व्यवसाय नाहीए. त्यामुळे बॉलिवूड आणि टॉलीवूड चित्रपटामधून कायम चढाओढ लागते. त्याचं बजेट आणि इन्फ्रास्ट्रॅक्चर पुढे मराठी सिनेमा काहीच नाहीए. कधीकधी ‘सैराट’ सारखे सिनेमा येतात, जे सुपरहिट होतात. मराठी चित्रपटसृष्टित पैसा टाकण्यापूर्वी निर्माता एकवार विचार करतोच. मराठीत खूप एक्सप्रेमेंटल आणि लो बजेटचे सिनेमे बनतात, परंतु आता चांगले चित्रपट येत आहेत, पुढे जाऊन भविष्य उज्ज्वल आहे.

तुला इथे पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष अजूनही आहे. चित्रपट एक व्यवसाय आहे, त्यामध्ये खूप पैसा लागलेला असतो. चित्रपट न चालल्यास तुमचं मानधन कधी नाही वाढत. चांगलं काम करुनदेखील सिनेमा चालला नाही तर मानधन खूप कमी मिळतं आणि निर्मातेदेखील अधिक पैसा गुंतवायला घाबरतात. आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे आजदेखील दुसरा मार्ग स्वीकारावा लागतो. टॉलीवूडमध्ये साधारण कलाकाराला ५० कोटी एका सिनेमासाठी मिळतात. तसंच इथे चांगले नाटय आणि चित्रपटगृह नाहीत. त्यामुळे लोकांना चांगली कलाकृती पाहता येत नाही. टीव्ही कलाकार अधिक प्रसिद्ध होतात, कारण टीव्ही प्रत्येक घरात  असतो. याशिवाय अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावत.

मराठी चित्रपटसृष्टीत नेपोटीज्मचा सामना करावा लागला होता का?

इथे नेपोटीज्म नाहीए, मी गेल्या १५ वर्षापासून या इंडस्ट्रित काम करतेय, इथले मोठे कलाकारदेखील बाहेरून येणाऱ्या कलाकारांचं कौतुक करतात आणि कधीही स्वत:च्या मुलांना इंडस्ट्रित आणण्यासाठी कोणावर जोर देत नाहीत. इथे सगळे एकमेकांच काम पाहतात आणि प्रंशसा करतात. इथे असं कोणतंही असं कुटुंब नाहीए जे परंपरेने इंडस्ट्रित आहे, जे हिंदीत पहायला मिळतं. इथे मोकळं वातावरण आहे. कथा खूप वेगळया पद्धतीने लिहिल्यामुळे सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार काम करण्याची संधी मिळते. इथे खूप हँडसम दिसणारा कलाकार हिरो बनतो आणि साधारण दिसणारादेखील हिरो बनू शकतो. इथे  सिनेमाची कथा स्टार असते. क्रिएटीव्हीटीमध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे पावर सेंट्रलाईज्ड होत नाही.

किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

फॅशन मला फार आवडत नाही, परंतु खूप फुडी आहे आणि प्रत्येक प्रकारचं महाराष्ट्रीयन जेवण बनविते.

हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल का?

मी काही खूप ग्लॅमरस अभिनेत्री नाहीए. आता हिंदीत खूपच प्रयोग केले जात आहेत आणि मला काम करायचं देखील आहे.

आवडता रंग – पिवळा.

आवडता पेहराव – भारतीय, खासकरून साडी.

आवडतं पुस्तक – पाडस, लेखक – राम पटवर्धन.

आवडतं पर्यटन स्थळ – देशात मनाली, परदेशात पॅरिस.

वेळ मिळतो तेव्हा – सोलो ट्रिप आणि खाणं बनविणं.

आयुष्यातील आदर्श – सहानुभूती, प्रेम आणि काळजी.

सामाजिक कार्य – मुलं आणि त्यांची मानसिकता.

स्वप्नातील राजपूत्र – फ्रेंडली.

स्वातंत्र्यदिन विशेष, कोण होणार करोडपती

स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे ‘कोण होणार करोडपती’ – कर्मवीर विशेषमध्ये येणार आहेत.

कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी  खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सह्याद्री देवराईसामाजिक संस्था, सातारा या संस्थेला सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी हे याभागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत.

सयाजी शिंदे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटक सृष्टी यातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. फक्त आपल्या अभिनयासाठी नाही तर आपल्या समाजसेवेसाठीसुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत. मनोज बाजपेयी यांनी आपल्या दर्जेदार  अभियनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. अनेक उत्तमोत्तम  कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत, अजूनही देत आहेत.

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी शूल या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटदरम्यानच्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला

मनोज बाजपेयी हे हरिवंश राय बच्चन यांचे चाहते आहेत. मनोज बाजपेयींनी  हरिवंश राय बच्चन यांची कविता मंचावर म्हणून दाखवली. मनोज बाजपेयी  यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावेपाहिले आणि ते त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेही  सांगितलं आहे.

पाहा, ‘कोण होणार करोडपती’

कर्मवीर विशेष, १४ ऑगस्ट, रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीर.

मी अभिनयासाठी फारसा संघर्ष नाही केला – किरण ढाणे

* सोमा घोष

मराठी मालिका ‘लागीर झालं जी’मधून अभिनयाला सुरुवात करणारी मराठी अभिनेत्री किरण ढाणे महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे. तिने या मालिकेत जयश्री (जयडी) ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मालिका हिट झाल्यामुळे किरणला घरोघरी ओळख मिळाली, परंतु तिने ही मालिका मध्येच सोडून ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत अभिनय करण्यासाठी गेली, कारण यामध्ये किरणची सकारात्मक प्रमुख भूमिका होती. तिला सकारात्मक भूमिका साकारायला आवडते. किरणला पहिला ब्रेक ‘पळशीची पी. टी’ या मराठी चित्रपटात वयाच्या विसाव्या वर्षी मिळाला, ज्यामध्ये तिने धावपटू पी. टी. उषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांनी खूपच कौतुक केलं आणि या चित्रपटाला तीन नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. किरणच्या या प्रवासात तिची आई राणी ढाणे, वडील मारुती ढाणे आणि बहीण प्रतीक्षा ढाणे यांची खूप मदत झाली. विनम्र आणि हसतमुख स्वभावाच्या किरणला प्रत्येक नवीन कथा आकर्षित करते. प्रत्येक व्यक्तीरेखेशी ती स्वत:ला जोडते. किरणशी तिच्या प्रवासबद्दल बातचीत झाली. सादर आहेत काही खास अंश :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मी अभिनयबद्दल फारसा विचार केला नव्हता, परंतु लहान वयातच मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. कॉलेजमध्ये शिकत असताना युथ फेस्टिवलसाठी मी नाट्य स्पर्धेत शिक्षकांच्या सांगण्यावरून भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. हे खरंय की मला अभिनयात एक वेगळी व्यक्तीरेखेत जगायला आवडायचं, कारण ते जगून तो भाव दाखवणं एक आव्हान होतं. याव्यतिरिक्त मला वाचायला आवडतं आणि वाचन करताना पूर्ण दृश्य व्हीज्युअलाईज करू लागायची. गोष्टीत मी स्वत:ला पहायला लागायची. त्यानंतर मी अभिनयात जाण्याचं ठरवलं. लहानपणी मी वेगवेगळया क्षेत्रात जाण्याबद्दल विचार करायची. कधी पोलिस, कधी एअर हॉस्टेस, तर कधी आणखीन काही… मग विचार केला या सगळया व्यक्तीरेखा अभिनयात करता येतील आणि अभिनय माझ्यासाठी योग्य आहे.

पहिल्यांदा अभिनयाच्या इच्छेबद्दल पालकांना सांगताना त्यांचे भाव कसे होते?

त्यांनी अगोदर नकार दिला, तसं माझ्या कुटुंबियांनी मला प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय, परंतु फिल्म इंडस्ट्रीबद्दल गैरसमज होते. त्यांना वाटायचं की मुली तिथे सुरक्षित नाहीएत. याशिवाय साताराहून मुंबईला जाऊन राहणं आणि संघर्ष करणं माझ्यासाठी खूप कठीण असेल. मीदेखील अभिनयाची इच्छा थिएटरने पुर्ण करायचं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये थिएटर करत असताना माझ्या पालकांनी मला सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला सांगितलं. मग अभिनय सोडून अभ्यास सुरु केला. यादरम्यान अभिनय शिकविणाऱ्या एका सरांनी माझ्यासाठी एक ‘वन अॅक्ट’ नाटक लिहिलं, परंतु मी अभिनय करण्यास नकार दिला, परंतु त्यांनी विनंती केल्यानंतर मी केलं आणि मला त्यावर्षी युनिव्हर्सिटीचं बेस्ट अॅक्ट्ररेसचा पुरस्कार मिळाला.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

‘वन अॅक्ट’ नाटक करत असताना मला ‘पळशीची पी. टी.’च्या दिग्दर्शकांनी पाहिलं आणि चित्रपटाची ऑफर दिली. यापूर्वीदेखील मला दोन चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, परंतु मी नकार दिला. या चित्रपटाची कथा ऐकून ती करण्याची इच्छा झाली त्यानंतर घरातल्यांची परवानगी घेऊन मी तो चित्रपट केला. त्या चित्रपटाचे लेखक तेजपाल वाघ एक नवीन मराठी मालिका ‘लागिर झालं जी’ लिहित होते. त्यांनी चित्रपटाच्या सेटवरच माझी ऑडिशन घेऊन त्या मालिकेच्या चॅनेलला पाठवलं. यामध्ये मी नकारात्मक प्रमुख भूमिका साकारली होती.

तुला हिंदीमध्ये काही करण्याची इच्छा आहे का?

मी काही दिवसांपूर्वी वेब सिरीजच हिंदीमध्ये पायलट शूट केलं होतं, परंतु पुढे काही रिस्पॉन्स नाही मिळाला. मला हिंदीत अभिनय करण्याची इच्छा आहे. मराठी मालिकेनंतर मला हिंदीत निगेटिव्ह भूमिकेसाठी ऑफर आली होती, परंतु मला ते करायचं नव्हतं. ‘लागिर झालं जी’मध्ये मी नकारात्मक भूमिका जयडी साकारली होती आणि आणि ती मालिका यशस्वी झाल्यामुळे लोकं मला त्याच नावाने अजूनही ओळखतात.

मराठी फिल्म इंडस्ट्रित तुला कधी कास्टिंग काऊचला समोर जावं लागलं का?

मला इंडस्ट्रित काम करण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही कारण मला समोरूनच पाहिली ऑफर मिळाली. त्या सेटवर मला दुसरी मालिका मिळाली, त्यानंतर माझा अभिनय पाहून ‘एक होती राजकन्या’मध्ये काम मिळालं. मी मराठी चित्रपट अगोदर केला होता, परंतु मालिका अगोदर टीव्हीवर आली आणि नंतर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने माझं आयुष्य बदललं, कारण हा चित्रपट फिल्म फेस्टिवलमध्ये गेला. मला २०१८ साली डेब्यू बेस्ट अॅक्ट्ररेस म्हणून ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत मिळाला, ज्यामुळे मला मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळाली आणि काम मिळणं सहजसोपं झालं. अजून मी तीन चित्रपटांचं चित्रीकरण केलंय, परंतु लॉकडाऊनमुळे डबींगचं काम बाकी आहे, जे लॉकडाऊननंतर करायचं आहे. सगळं काम पूर्वीचा अभिनय पाहून मिळालंय. मला मुंबईला जाऊन अभिन्यासाठी काम शोधावं नाही लागलं. साताराला काम मिळाल्यानंतर मुंबईत आली. त्यामुळे मला कास्टिंग काऊच वा नेपोटीजमबद्दल माहिती नाहीए.

सध्या तुझी दिनचर्या कशी असते?

मला वेगवेगळया भूमिका साकारायची इच्छा आहे आणि याची मी वाटदेखील पाहतेय. याशिवाय सध्या आगामी प्रोजेक्टसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. त्याचा सराव करते, ज्यामध्ये आरशात पाहून स्वत:शी बोलणं, भाव वेगळया पद्धतीने प्रकट करणं इत्यादी करते.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमर तुला किती आकर्षित करतं?

मी सुरुवातीला जेव्हा काम करायला आली होती, तेव्हा इंडस्ट्रीचं काम पाहून घाबरल्यामुळे मला ते करावंसं वाटत नव्हतं, कारण इंडस्ट्रीत माझ्या मागून लोकं काहीही बोलायची, जे मला नंतर समजायचं. गैरसमज पसरविणारी लोकं मला आवडत नाहीत. खरं म्हणजे ते माझ्या यशावर जळतात, खरंतर त्यांचं आणि माझं काम पूर्णपणे वेगळं होतं. यासार्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत मी पुढे काम करत गेली, तेव्हा चांगली लोकं मिळाली.

तू किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

मला वेगवेगळे पेहराव घालायला आवडतात, मी ते घालत असते. शॉपिंग खूप आवडते. मी खूप फुडी आहे आणि वेगवेगळया डिश आवडतात. तणावात असते तेव्हा अधिक खाते. आईच्या हातचं चिकन खूप आवडतं. मी गुलाबजाम खूप छान बनवते.

तू पावसाळयात स्वत:चं सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दिवसभराचा मेकअप उतरवणं गरजेचं आहे, कारण यामुळे चेहऱ्यावर रॅशेस येतात. मी पाणी खूप पिते आणि चेहऱ्यावर फक्त नॅचरल प्रॉडक्ट्स लावते. साताऱ्यातदेखील मी नैसर्गिक गोष्टींनी बनलेल्या स्किन केयर प्रॉडक्ट्सने त्वचेची काळजी घ्यायची.

आवडता रंग – सर्व रंग, खास काळा, बॉटल ग्रीन, इंद्र्रधनुष्य रंग.

आवडता पेहराव – भारतीय पेहराव, साडी, सलवार सूट.

पर्यटन स्थळ – परदेशातील मालदीव, भारतात केरळ आणि काश्मीर.

आवडतं पुस्तक – अट्मोस्ट हॅप्पीनेस -अरुंधती रॉय.

वेळ मिळाल्यावर – चित्रपट पाहणं आणि पुस्तकं वाचणं.

परफ्यूम – अर्माफ

स्वप्नातील राजकुमार – शाहरुख खान वा शाहिद कपूरसारखा.

जीवनातील आदर्श – गरजवंत आणि पेट्सची मदत करणं.

सोशल वर्क – आजूबाजूला राहणाऱ्या गरजवंताना मदत, तेदेखील जात, धर्म न जाणून घेता.

पद्मश्री नाना पाटेकर ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर…

*सोमा घोष

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत.

‘कोण होणार करोडपती’मध्ये आठवड्यातून एक दिवस ‘कर्मवीर विशेष’ भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या  भागात पद्मश्री अभिनेते ‘नाना पाटेकर’ कर्मवीर म्हणून येणार आहेत.

नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता. त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले.

कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत  तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधी.

पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’ – कर्मवीर विशेष, १७ जुलै, शनिवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेचं शीर्षकगीत देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात!

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीचे लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनीशीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’ १२ जुलैपासून,  सोम.-शनि., रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

होणार मनोरंजनाची बरसात, ‘अजूनही बरसात आहे.’

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. त्यांचे चाहते आणि प्रेक्षक त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले आहेत. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी ती दोघं एकत्र काम करणार आहेत.

सध्याच्या वातावरणात सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी ही खुसखुशीत मालिका  आणली आहे.  प्रेमाला कुठे असते Expiry Date, असं म्हणणार्‍या मुक्ता आणि उमेश यांची ही एक परिपूर्ण प्रेमकहाणी असणार आहे. मीरा आणि आदी ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. मालिकेच्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद केले आहेत तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’! १२ जुलैपासून सोम.-शनि. रात्री ८ वा.
सोनी मराठी वाहिनीवर.

शीतल-अभिजीतचं लव्ह साँग ‘लंडनचा राजा…’

*सोमा घोष

अलीकडच्या काळात सिंगल व्हिडीओ साँग्ज रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहेत. नवी कोरी गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर सहजपणे रुळतही आहेत. असंच एक नवं कोरं लव्ह साँग रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालं आहे. प्राजक्ता फिल्म प्रोडक्शनची आणि पिकल म्यूजिक ची निर्मिती असलेलं ‘लंडनचा राजा’ हे प्रेमगीत बऱ्याच कारणांनी आपलं वेगळेपण जपणारं आहे. सध्या लाइमलाईटमध्ये असलेली शीतल अहिरराव आणि अभिजीत श्वेतचंद्र या कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.

रेखा सुरेंद्र जगताप, नितीन माने आणि संजय शिंदे यांची निर्मिती आणि पिकल म्यूजिक प्रस्तुत असलेल्या ‘लंडनचा राजा.. या गाण्याच्या निमित्तानं रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शीतल आणि अभिजीत या गाण्यासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. नैतिक खरस आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत त्यांनीच संगीतबद्धही केलं आहे. नैतिक आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधूर आवाजात हे गीत रेकॅार्ड करण्यात आलं आहे. कैलाश काशिनाथ पवार यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, अलिबागमधील निसर्गरम्य परिसरात हे गाणं शूट करण्यात आलं आहे. या गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे.
एका राजा आणि राणीची गोष्ट यात दडली आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून ती हळूहळू उलगडत जाते आणि या गीतासोबत ऐकणाराही समरसून जातो हा ‘लंडनचा राजा.. या गीताचा प्लस पॅाइंट आहे. केवळ एक गाणं करण्याच्या भावनेतून नव्हे, तर गाण्याच्या माध्यमातूनही मनात उद्भवणाऱ्या काही तरल भावना रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे गाणं बनवण्यात आल्याचं दिग्दर्शक कैलाश काशिनाथ पवार यांचं म्हणणं आहे.

‘व्हीआयपी गाढव’ आणि ‘एचटूओ’ या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या शीतल अहिररावची मराठी प्रेक्षकांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. शीतलनं आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर मराठी सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिजीतनं यापूर्वी ‘व्वा पैलवान’, ‘तालीम’, ‘संजना’ या चित्रपटांद्वारे लक्ष वेधून घेतलं असून, सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आपापल्या परीनं स्वत:ला सिद्ध करणाऱ्या शीतल-अभिजीत यांनी ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ या गाण्यातही कमाल केली आहे. या रोमँटिक गाण्यात दोघांनी आपल्या परीनं एक वेगळाच रंग भरला आहे. त्यामुळं रसिकांनाही हे गाणं पहायला आणि ऐकायला आवडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये ही या गाण्याची आणखी एक जमेची बाजू आहे. या निमित्तानं रसिकांना अलिबागमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी दिली आहे.

पहिल्या पावसात मी भिजतेच भिजते – गौरी  नलावडे

* सोमा घोषलहानपणापासून अभिनयाची आवड असलेली मराठी अभिनेत्री गौरी नलावडे मुंबईची आहे. तिला नेहमीच वेगळया आणि चांगल्या कथांवर भूमिका साकारायला आवडते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली आणि एकामागून एक चित्रपट करत आहे. तिची पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’मधील तिच्या कामाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले आणि तिच्या कारकीर्दीची यशस्वी वाटचाल सुरू झाली. गौरीच्या या प्रवासात तिची आई अरुणा नलावडे यांनी तिला मोलाची मदत केली. कारण, लहान वयातच तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. तिच्या मुख्याध्यापक आईने तिचे पालनपोषण केले. तिचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नम्रपणे वागणाऱ्या आणि परखड बोलणाऱ्या गौरीशी तिच्या प्रवासाबाबत गप्पा मारता आल्या. याच गप्पांमधील हा काही खास भाग :

सध्या तू काय करत आहेस? कोविडदरम्यान काय काय केलेस?

जे चित्रपट बाकी होते ते पूर्ण केले आणि जे पूर्ण झाले आहेत, त्यांच्या प्रदर्शनाची वाट बघत आहे. ३० एप्रिलला मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. सर्व ठीक झाल्यावर लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. एक चित्रपट ‘द डिसाईपल’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात मी चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. याशिवाय अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्यांचे एडिटिंग सुरू आहे. कोविड महामारीमुळे खूप कमी चित्रपटांची निर्मिती होत आहे. जाहिराती आणि शूटिंगमध्ये उरलेली कामे केली जात आहेत. सध्या चित्रपटांची शूटिंग बंद आहे. या काळात घरात राहून पुस्तके वाचणे, घरातल्यांसोबत वेळ घालवणे, जेवण बनवणे, वर्कआऊट, झोप पूर्ण करुन घेणे इत्यादी कामे करत आहे. कोविडदरम्यान मी एक शॉर्ट फिल्म शूट केली होती, ज्यात माझ्यासोबत अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी काम केले आहे. कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन खबरदारी घेऊनच आम्ही शूटिंग पूर्ण केले.

अभिनयाची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

जेव्ही मी टीव्ही सुरू करायचे तेव्हा माधुरी दीक्षित, श्रीदेवी अशा सर्व अभिनेत्रींचा डान्स बघत असे. मला हे माध्यम खूपच प्रभावी वाटायचे, ज्याद्वारे व्यक्ती आपल्या सर्व भावना व्यक्त करू शकतो. मला तासन्तास टीव्हीसमोर बसून रहायला आवडत असे. शाळेतही अभ्यासाव्यतिरिक्तच्या इतर सर्व कार्यक्रमात मी सक्रिय सहभागी होत असे. मला कलेची आवड आहे, हे घरच्यांना माहीत होते. अभिनयाची इच्छा मी आईकडे बोलून दाखवली, कारण मला नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करायचा होता. आईने शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला, कारण या क्षेत्रात काम मिळेलच अशी खात्री नसते. सोबतच मला कोणीही गॉडफादर नाही, म्हणूनच मला माझ्या मेहनतीवर यश मिळवावे लागेल.

तुला कुटुंबाचे कितपत सहकार्य मिळाले?

कुटुंबाने नेहमीच सहकार्य केले. आईने माझ्या कामाचे भरभरुन कौतुक केले. फार्मसीची पदवी घेतल्यानंतर मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच मला पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मिळाली आणि वैदेहीच्या रुपात मी घराघरात लोकप्रिय झाले. माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी चित्रपटात काम करू लागले. या मालिकेने मला ओळख मिळवून दिली.

तू तुझ्या प्रवासाकडे कशी बघतेस? हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का?

माझ्या प्रवासाबाबत मी खूपच आनंदी आहे, पण कलाकार कधीच आपल्या कामात समाधानी नसतो. त्याची इच्छा वाढतच जाते. चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. जिथे मला नजरेसमोर ठेवून कथानक लिहिलेले असेल. यामुळेच मला योग्य काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, पण कथानक चांगले असायला हवे, जे मला समोर ठेवून लिहिलेले असेल. हिंदी आणि मराठी चित्रपटातील फरक हा केवळ भाषेचा असतो.

तुला कधी नेपोटिमचा सामना करावा लागला आहे का?

चित्रपट निवडताना मला एखाद्या तज्ज्ञाची कमतरता सतत भासते, ज्याचा सल्ला घेऊन मी योग्य निर्णय घेऊ शकेन. मला इंडस्ट्रीत खूप चांगली माणसे भेटली आणि त्यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. नेपोटिझमचा सामना कधीच करावा लागला नाही.

तू नकाराचा सामना कशी करतेस?

सुरुवातीला मला नकार मिळायचा तेव्हा स्वत:वरच संशय यायचा. खूपच वाईट वाटायचे. काळानुरुप लक्षात आले की, काही भूमिकांसाठी विशिष्ट चेहऱ्यांची गरज असते. निवडही सर्वांच्या मतानुसारच होते, कारण हा एक व्यवसाय आहे, ज्यात खूप पैसे लावले जातात. खरंतर माणूस नकारातून खूप काही शिकतो. म्हणूनच प्रत्येक नकारानंतर मी माझ्यातील कमतरतेवर मात करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता मला नकाराची भीती वाटत नाही.

तूला आईच्या हातचे काय खायला आवडते?

माझी आई पुरणपोळी खूपच छान बनवते. आईच्या हातच्या पुरणपोळीची चव खूपच वेगळी असते. मी चिकन चांगले बनवू शकते.

तू पावसाळयात स्वत:ची काळजी कशी घेतेस?

मला पावसाळा खूपच आवडतो. पहिल्या पावसात मी आवर्जून भिजते. पावसात गरम पाणी पिणे, वाफ घेणे, लवंगाचे पाणी पिणे, स्वत:ला स्वच्छ ठेवणे याकडे लक्ष देते. जेवणात तूपाचा वापर अवश्य करते. पावसाचे दिवस आहेत, हे लक्षात ठेवूनच प्रत्येक काम करायला हवे. मान्सूनमध्ये मी जास्त नॉनवेज खात नाही. अशा वातावरणात शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवणे फारच अवघड असते. त्यामुळे जास्त पाणी पिणे, चेहऱ्याला मॉईश्चराईज करणे गरजेचे असते. मला तूप खूप आवडते. जेवणात सकाळ, संध्याकाळ मी प्रत्येकी एक चमचा तूप घेते. तूप एखाद्या पदार्थात टाकून खाल्ल्यास वजन वाढत नाही.

एखादा मेसेज, जो तू देऊ इच्छितेस?

प्रत्येक दिवस सारखा नसतो. जीवनात कोणतीच गोष्ट कायम टिकून राहत नाही. म्हणूनच वर्तमानकाळात जे आनंदाचे क्षण मिळतात ते कुटुंबासोबत साजरे करा. परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि याला सर्वांनाच सामोरे जावे लागते. सध्या योग्य प्रकारे श्वास घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्राणवायू मिळू न शकल्याने लोक मरत आहेत आणि ही खूपच  दु:खद गोष्ट आहे.

आवडता रंग – गुलाबी.

आवडता पेहराव – जीन्स, टी शर्ट.

आवडते पुस्तक – द फोर्टी रुल्स ऑफ लव, लेखक एलिक शफाक.

वेळ मिळाल्यास – चित्रपट पाहणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, चेहऱ्यासाठी वेगवेगळया प्रकारचे मास्क बनवणे, डायरी लिहिणे.

आवडता परफ्यूम – अरमानी.

आवडते पर्यटनस्थळ – देशात हिमाचल प्रदेश, परदेशात अमेरिका.

जीवनातील आदर्श – करुणा, माणुसकी.

सामाजिक कार्य – गरजवंतांना मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – जो माझ्या मनासारखा असेल.

स्वप्न – कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये काम करणे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें