नात्यात जेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात

– सुमन बाजपेयी

राधा आणि अनुजच्या लग्नाला २ वर्षे झाली. राधाला आपल्या नोकरीच्या निमित्ताने बऱ्याचदा बाहेर जावे लागते. वीकेंडला जेव्हा ती घरी असते, तेव्हा तिला काही वेळ एकटीने वाचन करायला किंवा मग आराम करायला आवडते किंवा घरातील बारीकसारीक कामे करण्यात तिचा वेळ जातो.

अनुजला आठवड्यातील ५ दिवस तिला मिस करत असतो. त्यामुळे त्याची अशी इच्छा असते की ते २ दिवस तरी तिने त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. दोघांनी एकत्र आउटिंग करावे, पण राधा ट्रॅव्हलिंग करून थकलेली असल्याने, बाहेर जाण्याच्या नावानेच संतापते.

अनुजला राधाचे हे वागणे हळूहळू खटकू लागले. त्याला असे वाटू लागले की राधा त्याला अव्हॉइड करत आहे. तिला कदाचित तो आवडत नसावा असे त्याला वाटू लागले होते आणि राधाला असे वाटत होते की अनुजला तिची आणि तिच्या इच्छांची मुळीच पर्वा नाही. तो फक्त आपल्या गरजा तिच्यावर लादत होता असे तिला वाटत होते. अशाप्रकारे आपल्या पद्धतीने जोडीदाराविषयी अनुमान काढल्याने त्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहू लागली.

अनेक विवाह हे असे छोटे छोटे गैरसमज दूर न केल्यामुळे तुटतात. छोटासा गैरसमज खूप मोठा व्हायला वेळ लागत नाही.गैरसमज हा एखाद्या जहाजात झालेल्या छोटयाशा छिद्रासमान असतो. तो जर का वेळीच बुजवला गेला नाही तर नाते तुटायला वेळ लागत नाही.

भावना समजून न घेणे

गैरसमज हा एखाद्या काटयासारखा असतो आणि जेव्हा तो आपल्या नात्याला टोचू लागतो, तेव्हा कधी काळी फुलासारखे जपलेले नातेही जखमा करू लागते. जे युगुल कधीकाळी एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते, एकमेकांच्या बाहुपाशात ज्यांना सर्वस्व लाभत होते आणि जे आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होते त्या नात्याला गैरसमजाचा सर्प जेव्हा दंश करतो, तेव्हा नात्यातील गोडवा आणि प्रेम यांना तिरस्कारात बदलण्यात वेळ लागत नाही.

साधारणपणे गैरसमज म्हणजे अशी स्थिती असते, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे किंवा भावना समजून घेण्यास असमर्थ ठरते आणि जेव्हा हे गैरसमज वाढतात, तेव्हा मग भांडणे होऊ लागतात आणि याचा शेवट कधी कधी फार भयंकर असतो.

रिलेशनशिप एक्स्पर्ट अंजना गौड यांच्यानुसार, ‘‘साथीदाराला माझी पर्वा नाही किंवा तो फक्त स्वत:चाच विचार करतो अशा प्रकारचा गैरसमज युगुलांमध्ये निर्माण होणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराच्या प्राथमिकता आणि विचारांना चुकीचे समजणे खूप सोपे असते.‘‘स्वत:च्या दृष्टीने जोडीदाराच्या वागण्याचा अर्थ काढणे किंवा आपले म्हणणे जोडीदाराच्या समोर मांडण्यात इगो आडवा येणे ही खरी समस्या आहे. ही गोष्ट हळूहळू मोठे रूप धारण करते आणि मग गैरसमजाचे कधी कडाक्याच्या भांडणात रूपांतर होते आपल्याला कळतच नाही.’’

कारणे काय आहेत

स्वार्थी असणे : पती आणि पत्नीचे नाते दृढ होण्यासाठी आणि एकमेकांवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून न लपवणे आणि कायम एकमेकांना सांभाळून घेणे. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ असले पाहिजे. गैरसमज तेव्हा निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आत्मकेंद्री असता. फक्त स्वत:चा विचार करता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने अविश्वास दाखवणे स्वाभाविकच ठरते.

माझी पर्वा नाही : पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही असे वाटू शकते की आपल्या जोडीदाराला आपली पर्वा नाही आणि तो आपल्यावर प्रेमही करत नाही. पण वास्तव हे आहे की विवाह हा प्रेम आणि काळजी यांच्याआधारे टिकून असतो. जेव्हा जोडीदाराला आपण इग्नोर होत आहोत किंवा आपली गरज नाही असे वाटू लागते, तेव्हा गैरसमजाचे उंच बुरुज उभे राहतात.

जबाबदाऱ्या पार पाडण्यात कमी पडणे : जेव्हा जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यात कमी पडतो किंवा घेत नाही तेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशावेळी मनात असे प्रश्न उठणे स्वाभाविक असते की त्याचे आता आपल्यावर प्रेमच नाही का? त्याला माझी पर्वाच नाही का? तो जबरदस्ती तर माझ्यासोबत संसार करत नाही ना? असे गैरसमज नात्यांमध्ये येऊ नयेत म्हणून प्रत्येक युगुलाने आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजेत.

काम आणि कमिटमेंट : हल्ली स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरापुरतेच मर्यादित राहिलेले नसून विस्तृत झाले आहे. आता त्या हाउसवाइफच्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पतिने त्यांच्या काम आणि कमिटमेंटची योग्य कदर करणे गरजेचे आहे. बदलणाऱ्या परिस्थितीत पत्नीस सर्वतोपरी सहकार्य करावे. नात्यात आलेला हा बदल स्वीकारणे हे पतिसाठी निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण हीच गोष्ट आजच्या काळात गैरसमजाचे मोठे कारण ठरू पाहत आहे. त्यामुळे दोघानांही आपापल्या कमिटमेंट्स एकमेकांशी डिस्कस करून त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

धोका : हे सर्वात सामान्य कारण आहे. हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा एका जोडीदाराला वाटू लागते की आपल्या पार्टनरचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. आणि हे तो कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधाराशिवायही मानू शकतो. असे ही होऊ शकते की ती गोष्ट खरीही असेल. पण ही गोष्ट जर योग्य रीतीने हाताळली गेली नाही तर लग्न मोडूही शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार अस्वस्थ आहे आणि तुमच्याकडे संशयाने पाहत आहे तेव्हा त्वरित सतर्क व्हा.

दुसऱ्यांचा हस्तक्षेप : जेव्हा दुसरे लोक मग ते तुमचे कुटुंबातील सदस्य असोत की तुमच्या मित्रपरिवारापैकी किंवा नातेवाईक. जर ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू लागले तर गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशा लोकांना दोघांमध्ये भांडणे लावून दिली की आनंद होतो. आणि त्यांचा स्वार्थ साधला जातो. पती आणि पत्नीचे नाते भले कितीही मधुर असो, त्यात किती का प्रेम असो, पण मतभिन्नता आणि भांडणे ही होतातच आणि हे अस्वाभाविकही नाही. असे झाल्यास कोणा तिसऱ्या व्यक्तिस आपल्या समस्या सांगण्यापेक्षा स्वत:च त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे.

सेक्सला प्राधान्य द्या : सेक्स संबंध हे वैवाहिक जीवनातील गैरसमजाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पती पत्नी दोघांचीही इच्छा असते की सेक्स संबंध एन्जॉय करावेत. पण जेव्हा तुम्ही त्यात दुरावा निर्माण करता, आणि तो नात्याला कमकुवत करू लागतो. तुमचा साथीदार तुमच्यावर खुश नसेल किंवा तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर यामुळे नात्यात खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

माहेर तुमची बँक नव्हे

* डॉ. विभा सिंह

मुलीचं सासर कितीही संपन्न असलं तरी तिला माहेरहून काहीतरी मिळवण्याची एक आशा असते आणि ही इच्छा तिच्या म्हातारपणापर्यंत तशीच राहाते. मात्र ही देवाणघेवाण योग्य पद्धतीने झाली तर ठीक आहे, पण जर कुटुंबियांमध्ये आपापसांतच लपवाछपवी होऊ लागली तर तेव्हा मात्र ही गोष्ट डोळ्यांना खुपू लागते.

मायलेक दोघी दोषी

माझ्या लांबच्या नात्यातली एक मावशी आहे. एकदा त्यांचे पती मुंबईला गेले आणि तिथून ८-१० मीटर महागडं कापड घेऊन आले आणि मग ते कापड मावशीला देत म्हणाले की त्यांना विचारल्याशिवाय ते कापड कोणालाच द्यायचं नाही. काही दिवसांनी काकांना मुलीच्या सासरी जावं लागलं. त्यांनी विचार केला की आपल्या नातीसाठी फ्रॉक शिवायला त्या कापडामधून थोडं कापड घेऊन जावं. म्हणून त्यांनी मावशीकडे कापड मागितलं. पण कापड बघताच त्यांच डोकं सटकलं; कारण ते दोन अडीच मीटरपेक्षा जास्त नव्हतं. त्यांनी मावशीला विचारलं तर ती म्हणाली, ‘‘कदाचित तुम्हीच काहीतरी शिवायला दिलं असेल आणि विसरला असाल, नाहीतर कापड कुठे जाईल?’’

असो, पण मग काका ते उरलेलं कापड घेऊन गेले. मुलीच्या घरी गेल्यावर अंगणात त्याच कपड्याची मॅक्सी घालून आपल्या नातीला खेळताना बघून मुलीला भेटण्याचा त्यांचा सगळा उत्साहच मावळला. त्यांना आपल्या पत्नीचाही खूप राग आला. तिने त्यांना न विचारता मुलीला ते कापड दिलं आणि विचारल्यावर माहीत नसल्याचं सांगितलं. या गोष्टीवरून ते इतके रागावले की आपल्या मुलीला काही न देताच ते परतले आणि घरी येऊन आपल्या पत्नीबरोबर खूप भांडले.

या सगळ्यात दोष कोणाचा होता, आईचा की मुलीचा? निश्चितच दोघींचा होता. कारण जर पतीने न विचारता कोणाला कापड देऊ नकोस असं सांगितलं होतं; तर मग पतीच्या परवानगीशिवाय का दिलं? आणि निश्चितच ते घेताना मुलीलादेखील ही गोष्ट कळली असेल, आईच्या तोंडून किंवा तिच्या हालचलाखीवरून. आणि ही गोष्ट कळूनसुद्धा जर ती काही घेते, तर चूक तिचीही आहे.

पितळ उघडं पडल्यावर नाचक्की

आमचे शेजारी दिनेशजींच्या पत्नीबद्दल ऐका. त्यांची सूनबाई काश्मीरला फिरायला गेली. तिथून ती बरंच सामान घेऊन आली. विशेष म्हणजे सूनबाई आपल्या पसंतीच्या दोन शाली घेऊन आली. एक स्वत:साठी आणि एक सासूबाईंसाठी. नणंदही आली होती म्हणून तिच्या मुलांसाठी लोकरीचे कपडेही घेतले.

सून येणार त्याच दिवशी नणंदेलाही सासरी परतायचं होतं. त्यामुळे घाईघाईत तिने सामानाची बॅग सासूकडे दिली आणि सांगितलं की कोणासाठी काय काय आणलं आहे. नणंद निघून गेली. नंतर सुनेने आपल्या वस्तू पाहिल्या तेव्हा तिला त्यात शाल मिळाली नाही. तिने सासूला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘इतकी मोठी शाल कुठे हरवणार बरं… मला तर वाटतंय की तू दुकानातच सोडून आली असशील?’’

सुनेला चांगलं माहीत होतं की ती शाल घेऊन आली होती. मग शाल गेली कुठे? शिवाय सासूबाईंवर संशय घेण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. म्हणून मग तिनेही या गोष्टीला सोडून दिलं.

काही दिवसांनी सुनेला आपल्या नणंदेच्या घरी जाण्याची संधी चालून आली. त्यांच्या सर्वांचा एका हिल स्टेशनवर जाण्याचा कार्यक्रम होता, तिथे गेल्यावर सूनबाई म्हणजे वहिनी नणंदेला म्हणाली, ‘‘ताई, मी तर शाल आणलीच नाही. तुमच्याजवळ जर असेल तर मला द्या ना…’’

नणंद कामात होती म्हणून तिने कपाटाची चावी देत वहिनीला म्हटलं, ‘‘वहिनी, तीन शाली आहेत, जी आवडेल ती काढून घे.’’

वहिनी शाल काढू लागली तेव्हा तिची नजर स्वत: विकत आणलेल्या काश्मिरी शालीवर पडली आणि ती हैराण झाली.

तोपर्यंत नणंदेलाही ही गोष्ट आठवली आणि ती धावतच खोलीमध्ये आली आणि म्हणाली, ‘‘थांबा वहिनी, तुम्हाला शाल भेटणार नाही. मी शोधते. पण तोपर्यंत तर शाल वहिनीच्या हातात आली होती.’’

आता मात्र वहिनीसमोर नणंदेची लाजेने जी मान खाली झाली, त्याबद्दल काय म्हणावं. शाल घेताना तिला ही गोष्ट माहीत नव्हती असंही नाही. ती शाल तिच्या वहिनीने स्वत:साठी पसंत केलेली आणि तिला तिच्यापासून लपवून तिला दिली होती. त्यामुळे ती शरमिंदी झाली.

एक तर चोरी वर शिरजोरी

आमच्या शेजारच्या कमलाजींना सहा मुली आहेत. सगळ्या विवाहित आहेत. एक सून आहे आणि ती खूपच समजूतदार आहे. ती जेव्हापासून लग्न होऊन आलेली तेव्हापासून तिने तिच्या सासूला तिच्यापासून, तिच्या पतीपासून आणि सासूसाऱ्यांपासूनही कायम लपूनछपून काही न काही देताना पाहिलं आहे.

सुरुवातीला २-३ वर्षं तर ती नवीन असल्यामुळे काहीच बोलली नाही पण मग एके दिवशी तिने बोलण्याबोलण्यात हे विचारलं की, ‘‘आई, तुम्ही सर्व ताईंना जे काही देता, ते आमच्यापासून लपून का बरं देता?’’

बस्स, सुनेने इतकंच विचारलं होतं की सासूबाई बिथरल्या. त्या नको नको ते सुनेला बोलल्या.

त्यावेळेस तर ती काहीच बोलली नाही. पण सासूबाईंचे बोललेले शब्द तिला टोचले आणि त्यांच्याविषयी तिच्या मनात रोष उत्पन्न झाला. मग तर सासूबाईंच्या लाख सावधगिरीनंतरही जेव्हा कधी नणंदा घरी आल्यावर त्यांना सासूबाईंनी काही देताना सुनेने बघितलं की मग तीच भांडू लागायची.

त्यांच्या भांडणामुळे जी गोष्ट आतापर्यंत घरात होती, ती शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही कळली. त्यामुळे मुलाला आणि सुनेला बहिणी व नणंदा डोळ्यांत खुपू लागल्या, त्यांच्या बाबतीत त्यांच्या मनात तिरस्कार आणि रागाच्या भावनेने जन्म घेतला आणि याचा परिणाम त्यांच्या आपापसांतील संबंधांवर झाला.

कुटुंबियांना जरूर सांगा

प्रत्येक आईने आपल्या मुलीला कोणतीही वस्तू मग ती एक पैशांची का असेना आपल्या पती आणि मुलाला व सुनेला सांगूनच द्यावी. ती जर त्यांच्या ऐपतीनुसार असेल तर ते कधीच नाकारणार नाही आणि ऐपतीपेक्षा जास्त असेल तर ते देणंच मुळी चुकीचं आहे.

याबाबतीत मुलीनेही समजूतदारपणे वागावं. जेव्हा आपली आई आपल्या वडील आणि भाऊभावजयीपासून लपूनछपून तिला काही देत असेल तर तिनेही ती गोष्ट घ्यायला नाकारलं पाहिजे. तिला जो आनंद सर्वांसमोर दिलेल्या वस्तूमुळे होईल तो लपवून दिलेली वस्तू नेण्यात होणार नाही.

सासूची ही वागणूक सुनेला बोचते

आणखीन एक दृश्य बघा. इथेही देण्याची भावना काहीशी त्याच प्रकारची आहे, पण पद्धतीत थोडासा बदल झाला आहे. माझ्या चुलतसासूला ३ मुली आहेत. सर्वांचं लग्न झालं आहे. घरात दोन सुना आहेत.

एकदा त्यांची मधली मुलगी सासरी जाणार होती. मला तिला भेटायचं होतं म्हणून मीही तिथे गेले. तिथे जाऊन काही वेळ बसल्यानंतर मला जाणवलं की तिची आई तिच्या जाण्याच्या तयारीत काही जास्तच व्यस्त होती. तिने तिचं लहानसहान सामान ठेवण्यासाठी एक मोठीशी बॅगही रिकामी करून आणली. वाटेत चहासाठी थर्मास आणि पाण्यासाठी बाटलीदेखील बाजारातून मागवली. मी असतानाच सर्व वस्तूंची जुळवाजुळव झाली.

बॅगेमध्ये मुलगी जेव्हा जुनी साडी अंथरून त्यावर कपडे ठेवू लागली तेव्हा पटकन् आईने असं म्हणत एक मोठा टॉवेल तिला दिला की ‘हा अंथरून घे, वाटेत पाणी वगैरे सांडलं तर कपडे खराब होतील.’

असो, पेटीत कपडेही ठेवले गेले. आता जेव्हा कुलूप लावायची वेळ आली तेव्हा आईने पेटीला लावलेलं लहान कुलूप काढून पेटीतच टाकलं आणि घराचं मोठं कुलूप लावलं आणि म्हणाली, ‘‘प्रवासात कधीही मजबूत कुलूप असावं. लहान कुलूप कोण जाणे कोणीही तोडेल आणि बॅगेतील सर्व वस्तू जातील.’’

मी हैराण होऊन ही सगळी तयारी पाहात होते. मान्य आहे की माहेरहून सासरी जायला तिला ४८ तासांचा रेल्वेचा प्रवास करायचा होता, पण हाच प्रवास तिने माहेरी येतानाही केला होता. मग अशी नव्याने सगळी तयारी का बरं?

ती तर निघून गेली, पण दोन दिवसांनी मी जेव्हा त्यांच्या सुनांशी याबाबत बोलले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘वहिनी, तुम्ही जे बघितलं, ते तुमच्यासाठी नवीन आहे, आमच्यासाठी नाही. त्या जेव्हा जेव्हा इथून जातात, आई त्यांना या सर्व गोष्टी देतात. अशाप्रकारे वस्तू देणं आम्हाला खुपतं तर खूप, पण करणार तरी काय?

किती आश्चर्याची गोष्ट आहे की जेव्हा त्या सासरहून माहेरी ट्रेनने आल्या तेव्हा तिला कशाचीच गरज पडली नाही. तिला जर गरज होती तर तिने आपल्या गरजेच्या वस्तू सोबत आणायला नको होत्या का?

सांगायचं उद्दिष्ट हे नाही की मुलीला एखाद्या गोष्टीची गरज पडली तर आईने ती देऊच नये. खरंतर गरजेनुसार द्यावीही, पण पद्धतशीरपणे द्यावी.

मुलीनेही आपल्या माहेरहून जितकं जास्त तितकं आणि कसंही करून घेण्याची भावना ठेवू नये. प्रत्येक वेळेस माहेरहून लहानसहान सामान घेण्याची आशा बाळगू नये. उलट आई जर चुकीच्या पद्धतीने सामान देत असेल तर ते घ्यायला नकार द्यावा.

लढाई…अशीच हरू नका

* नितिन शर्मा, ‘सबरंगी

दृष्टीकोन बदलला की बरंच काही बदलतं. उदास वाटणाऱ्या आयुष्यातही उत्साह संचारतो. यासाठी संयम, विवेक आणि योग्य संतुलन आवश्यक आहे. जे असं करू शकत नाहीत ते निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. जेव्हा तुम्ही जिंकण्याच्या निर्धाराने पुढे जात राहाता तेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितिलाही अनुकूल बनवता. पण जो वेळेआधीच हरतो तो स्वत: तणावाखाली राहातो आणि आपल्या कुटुंबालाही न विसरू शकणारं दु:खं देतो. समाजातही चुकीचा संदेश जातो. लोक त्याला भित्रा म्हणू लागतात. त्याच्या जिंवतपणी किंवा पश्चात ‘भित्रा’ अशी त्याची ओळख बनली तर ती त्याच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकते.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात राहाणारी ४६ वर्षीय नीता गुलाटी सरकारी शाळेत शिक्षिका होती. ती इतकी सुंदर होती  की सगळे तिची स्तुती करत. तिचा नवराही सरकारी कर्मचारी होता. तिचा एक मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षण घेत होते. कुटुंबात आनंद नांदत होता. वरवर दिसताना सगळं ठिक दिसत होतं. पतिपत्नीमध्ये कोणताही वाद नव्हता किंवा घरात कशाचीही कमतरता नव्हती. या सगळ्यापासून लांब नीता एका वेगळ्याच दुनियेत जगत होती, ती डिप्रेशनमध्ये होती आणि याची जाणीव तिच्या नवऱ्यालाही नव्हती.

एके दिवशी संध्याकाळी नीता घरात एकटी होती. नवरा घरी आला तेव्हा त्याला तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. आपल्या अर्धांगिनीची ती अवस्था पाहून तो बेभान झाला. नीताने गळ्याभोवती फास आवळून आपल्या श्वासांची मालिका रोखून भ्याडपणा दाखवून दिला होता. आजूबाजूची माणसं गोळा झाली.  आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आनंदी कुटुंबातल्या नीताने हे पाऊल उचललं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता.

आत्महत्येचं कारण

नीताने आपल्या आत्महत्येचं कारण एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. ‘‘सॉरी, पण काय करु? माझ्या आजारपणाने हैराण झाले आहे.’’

खरंतर नीता सनबर्नला कंटाळली होती आणि यामुळे डिप्रेशनमध्ये होती. ३ वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारांनी आजार बरा होऊ शकत होता. पण तरीही नीता डिप्रेशनमध्ये होती.

सूर्याच्या अल्ट्राव्हायोलट किरणांमुळे त्वचा जळजळते, त्याला सनबर्न म्हणतात. पाणी पिऊन त्वचा झाकून ठेवून, उन्हापासून लांब राहून आणि सनस्क्रीन लावून हा आजार सहज बरा होऊ शकतो. पण नीताला नकारात्मकतेने ग्रासलं होतं. हळूहळू ती डिप्रेशनमध्ये इतकी शिरत गेली की तिने कुटुंबाचा आणि स्वत:चा विचार न करता चुकीचा मार्ग निवडला.

नीताच्या जवळच्या माणसांचा विश्वासच बसत नव्हता की इतक्या क्षुल्लक कारणासाठी कोणी आत्महत्या करू शकतं. पण संशय येण्यासारखं काहीच नव्हतं. नीता तिच्या कुटुंबासाठी आता फक्त आठवणीतच राहिली. सकारात्मक दृष्टीकोन आणि विचारानं ती स्वत:लाही सावरू शकत होती.

धावपळीच्या आयुष्यात विविध कारणांमुळे डिप्रेशन येणे ही मोठी गोष्ट नाही. प्रत्येकजण थोड्याफार प्रमाणात याचा बळी ठरतोच. पण वेळीच या तणावावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचं रूपांतर विविध आजारांमध्ये होऊन तुमचं आयुष्य तुम्हाला वाईट दिसू लागतं. हे ते भयंकर क्षण असतात जे तुम्हाला मृत्यूच्याजवळ नेऊन ठेवतात.

आयुष्य ओझं वाटत असेल तर जगण्याची पद्धत बदला. नाजूक क्षणी विचारीपणाने निर्णय घेतले तर भविष्यातील अडचणी टाळता येतात. जे वेळीच सावरत नाहीत, त्यांना अनपेक्षित घटनांना सामोरं जावं लागतं.

तुम्हाला तुमच्या जवळपास असे काही लोक भेटतील जे तुमच्यापेक्षा जास्त त्रासात आहेत. कोणी अंध आहेत तर कोणी अपंग. पण आपल्या हिंमतीच्या जोरावर वेळ निभावून नेतात आणि इतरांसाठी आदर्श बनतात. लक्षात ठेवा, या जगात करोडो लोक आहेत जे तुमच्यासारखं आयुष्य जगायला आसुरतात. कोणाकडे खायला अन्न नाही, कोणाकडे कपडे नाहीत, डोक्यावर छत नसतं, उपचारासाठी पैसे नाहीत, पण तरीही ते आनंदाने जगत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी असते. लहानसहान गोष्टींमुळे विचलित होऊन लोक आयुष्यात हार मानू लागले तर त्यांची यादी रोज मोठी असेल. आयुष्यातली ध्येयं कायम ठेवा आणि प्रत्येक स्थितीत जगण्याची कला शिका, कोणत्याही वाईट विचारांना आणि त्रासाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. यामुळे अडचणी कमी होण्यापेक्षा वाढतील. प्रतिकूल स्थिती कधीच कायम राहात नाही, आपलं संपूर्ण लक्ष समस्येतून मार्ग काढण्याकडे असलं पाहिजं.

अशीही माणसं आहेत जी आपला दृष्टीकोन बदलून आपल्या हाताने आयुष्य सावरतात, अगदी तेव्हाही जेव्हा मनात काही वाईट विचार येतात आणि आयुष्य डोंगराएवढं वाटू लागतं.

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये राहाणाऱ्या अनिता शर्मा उर्फ भैरवी यांच्या कानाखाली एक गाठ आली. गाठीने कॅन्सरचं रूप घेतलं. यामुळे अनिताची झोपच उडाली आणि ती चिंताग्रस्त झाली. आता जगण्यात काहीच अर्थ नाही असं वाटू लागलं.  पण त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला. तेव्हा त्यांना कळलं की सकारात्मक बनून आजाराबरोबरच अनेक नकारात्मक गोष्टींशी लढता येतं. आता त्या चांगलं आयुष्य जगत आहेत. निराशेमुळे त्रास आणखी वाढतो याची जाणीव झाली. अनीताने आयुष्य जगण्याची पद्धत बदलली. त्या आपला जास्तीत  जास्त वेळ झाडंझुडपं, प्राणी-पक्षी यांच्यासह घालवू लागल्या. यामुळे त्यांना जणू काही जगण्याचं कारण मिळालं. अनिताचं महागडं ऑपरेशन होणार आहे. इतके पैसे त्यांच्याकडे आता नाहीत की तात्काळ उपचार होतील. पण यामुळे त्या अस्वस्थ नाहीत. त्या आपलं संतुलन राखून आनंदी जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. परिस्थिसमोर हरणं म्हणजे आयुष्य नाही.

पोलिस विभागात वायरलेस ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी सिंह पुंडीरनेही दृष्टीकोन बदलून स्वत:ला आणि कुटुंबाला सावरण्याचं काम केलं. २ वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं. आजारपणाच्या विचारानेच त्या कोसळल्या. ऑपरेशन आणि केमोथेरेपीने प्रकृती अधिकच बिघडली.

आजारपणावर लाखो रुपये खर्च झाले आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. अशा परिस्थितीशी झगडताना अशा आयुष्यापासून सुटका करून घ्यावी असं वाटायचं. पण अशावेळी त्या आपल्या ३ मुलांचा विचार करत. त्यांच्यासह स्वप्नं रंगवत. डिप्रेशन बरात काळ राहिलं. पण त्या आपल्या सकारात्मक विचारांनी निराशेवर मात करत. परिणामी बऱ्याच उपचारांनंतर त्यांचा आजार बऱ्याचअंशी नियंत्रणात आला.

‘‘जेव्हा तुमच्यासोबत काही नकारात्मक घडतं तेव्हा एक गोष्ट सकारात्मक घडते की तुम्ही तुमची आशा कधीच सोडत नाही. ठाम विश्वास मनात असला पाहिजे. असाच विचार करा की मला जगायचंय. मग एक दिवस सगळं ठीक होतं.

माझ्या शरीरात कॅन्सर मोठ्या प्रमाणात पसरला होता. फोर्थ स्टेजला होता. मी असाच विचार केला की मला जगायचंय आणि माझ्या आजाराला हरावं लागलं.’’ असं लक्ष्मी सांगतात.

डिप्रेशनला बळी पडू नका

डिप्रेशन म्हणजे तणाव एक गंभीर मानसिक आजार आहे. बऱ्याच संशोधनात   असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत या आजाराचं प्रमाण महिलांमध्ये    जास्त आढळतं. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिप्रेशन भावना, आकलन, वर्तणूक आणि विचारांवर वाईट परिणाम करते. हळूहळू ते माणसाला अशा अवस्थेत नेतं की त्याचं जग उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटू लागतं. जगण्यासारखं काही उरलेलंच नाही असं वाटू लागतं. यामुळे माणूस आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतो. याची बरीच कारणं असू शकतात. मेंदूमध्ये संदेश प्रसारीत करणाऱ्या रासायनिक संदेशवाहक न्यूरोट्रांसमीटरच्या असामान्य स्तराची डिप्रेशनमध्ये महत्त्वाची भूमिका असते. मानसिक रोग,   कमकुवत व्यक्तिमत्त्व, निराशाजनक दृष्टीकोन ही कारणं त्यामागे असतात. याच्या लक्षणांत उदासिनता, निराशा, निद्रानाश, भूक कमी लागणे, थकवा, न्यूनगंड, एकटेपणा, आनंदी क्षणांपासून अलिप्त राहाणं, अस्वस्थता, चिडचिड, सतत डोकेदुखी यांचा समावेश असतो.

डिप्रेशनचा उपाय आपल्या स्वत:च्या हातात असतो. तुम्ही त्यातून कशाप्रकारे     बाहेर पडू इच्छिता हे तुमच्यावर अवलंबून असतं.

मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्याने तुम्ही डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर पडू शकता. स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा          वेळ काढा. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा, कारण व्यसन डिप्रेशनला पूरक असतं. आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. अशी नाती जोडा जिथे तुम्हाला         मनमोकळं बोलता येईल. माणसांमध्ये मिळून मिसळून राहा. तरीही डिप्रेशन कमी झालं नाही तर एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जा. त्यांनी दिलेल्या औषधांचे नियमित सेवन करा आणि त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा फक्त औषध हाच यावरचा उपाय नाही. याच तुमची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टीकोनही तितकाच महत्त्वाचा आहे.

लिव्ह इन रिलेशन, जेव्हा होईल ब्रेकअप

* आरती प्रियदर्शिनी

राखी काही दिवसांपासून खूपच तणावात दिसत होती. ऑफिसमधील कामात तिचे लक्ष लागत नव्हते. तिचे पद जबाबदारीचे होते. अशावेळी बॉसने तिच्यावर चिडणे स्वाभाविक होते.

तिची सहकारी नीलिमाला याचे वाईट वाटले. एक दिवस जेवणाच्या सुट्टीत तिने राखीच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि राखीने मन मोकळे केले.

‘‘नीलिमा, मी आणि मिहीर वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. लग्नासाठी मी आईवडिलांनाही तयार केले होते. मात्र आता तो या नात्याला कंटाळला आहे. त्याला स्पेस हवीय. काही आठवडयांपासून आम्ही एकाच छताखाली पण अनोळखी असल्यासारखे राहतोय. तीन दिवसांपासून तर तो मला भेटलाही नाही. मेसेज नाही, कॉल नाही, रिप्लायच देत नाही,’’ असे सांगून ती ढसाढसा रडू लागली.

नीलिमाने तिला मनमोकळेपणे रडू दिले. त्यानंतर स्वत:च्या घरी घेऊन गेली. नीलिमा आईवडील आणि भाऊ-वहिनीसोबत राहत होती. राखीला एका कुटुंबाचा भावनिक आधार मिळाला आणि मैत्रिणीचा पाठिंबा. यामुळे तिचे मनोबल वाढले आणि ती पुढील आयुष्य हसतमुखाने जगू शकली.

राखीसारख्या कितीतरी मुलींना सहजीवन किंवा लिव्ह इन रिलेशनशिपने  मोहजालात अडकवले आहे, यातून बाहेर पडताना त्या पूर्णपणे कोलमडून जातात आणि हाती लागतो तो केवळ हताशपणा, मानसिक निराशा.

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिली होती, तेव्हा तरुणाई आनंदित झाली. जणू मोकळे आकाश आणि स्वच्छंद विहारासाठी त्यांना सोनेरी पंख गवसले होते. परंतु आता या नात्यातील स्वच्छंदीपणा अनेकांना घायाळ करत आहे. यात महिला, मुली अधिक आहेत.

नॅन्सीसोबत तर खूपच वाईट घडले. प्रकाशसोबतच्या ६ महिनांच्या सहजीवनानंतर अचानक एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. या दु:खातून ती कशीबशी बाहेर पडत नाही तोच आपण आई होणार असून गर्भपाताची वेळही निघून गेल्याचे तिला समजते. हताशपणे ती आत्महत्येचे चुकीचे पाऊल उचलते आणि मागे सोडून जाते ते आपले दु:खी कुटुंब व त्यांची अनमोल स्वप्नं जी कधीकाळी त्यांनी नॅन्सीसाठी पाहिली होती.

महानगरात अशी कितीतरी उदाहरणं दिसतील. आता प्रश्न असा आहे की लग्नसंस्था हे बंधन आणि लिव्ह इन स्वातंत्र्य आहे तर मुलींना इतका त्रास का सहन करावा लागतोय? याचे उत्तर आहे समाजाची दुतोंडी मानसिकता.

भारतीय महिलांसाठी सामाजिक आणि भावनात्मक स्तरावरही संबंध तोडणे अजूनही सोपे नाही. पुरुष असे संबंध तोडून लग्नही करतात आणि समाज ते स्वीकारतेही, पण तोच समाज महिलांच्या चारित्र्यावर बोट ठेवतो.

अशा परिस्थितीत आपण काही गोष्टींचे पालन करून सुखी जीवन जगू शकतो. लिव्ह इनचे नाते तुटल्यानंतर पळपुटेपणा पत्करण्यापेक्षा हा आपला अनुभव समजून त्यातून धडा घ्या. हे खरे आहे की महिलांसाठी जोडीदाराचा सहवास विसरणे आणि भविष्यातील संघर्षाचा सामना करणे सोपे नाही. परंतु जीवन प्रवाही आहे. म्हणूनच यातून बाहेर पडण्यासाठी गरज आहे ती या नात्याशी जोडल्या गेलेल्या काही पैलूंचा सारासार विचार करण्याची.

स्वत:ला कामात गुंतवून ठेवा : तुम्ही नोकरी करत असाल तर स्वत:ला कामात गुंतवून ठेवणे थोडेसे सोपे आहे. आपल्या कामावरील टार्गेटवर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराला आपलेसे कसे करावे, याचा सतत विचार करू नका कारण त्याने पूर्ण मानसिक तयारीनिशीच तुम्हाला सोडून दिले आहे. त्यामुळे तो परत येणार नाही.

नोकरी न करणाऱ्या मुलींनी जास्तीतजास्त वेळ कुटुंबासोबत घालवावा. स्वत:मधील एखाद्या कलेला विकसीत करा. ती सर्व कामे करा जी यापूर्वी वेळ कमी असल्यामुळे तुम्ही करू शकला नाहीत. कधीतरी आपल्या भावनांना कागदावर शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करा. मनातील वेदना काहीशी कमी होईल.

लोक तर बोलणारच : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेताना तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले असेल. लोग काय म्हणतील, याची पर्वा केली नसेल. मग आताही तसेच करा. शांतपणे त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आपली बाजू मांडण्याचा किंवा आपणच कसे बरोबर आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही.

न्यूनगंड बाळगू नका : तुम्ही केवळ मैत्रीच्या एका नात्यापासून वेगळे झाला आहात. तेव्हा स्वत:ला घटस्फोटीत समजू नका. तुम्ही कुठला गुन्हा केलेला नाही. यौनशुचितेच्या तराजूवरही स्वत:ला तोलू नका. शारीरिक संबंध ठेवणे एक नैसर्गिक क्रिया आहे. त्याचा न्यूनगंड बाळगू नका. जोडीदारासोबत घालवलेल्या सुखद क्षणांनाच जीवनात स्थान द्या. त्याच्याबद्दल मनात द्वेष नसावा. समोरासमोर आल्यानंतरही ओरडू नका, टोमणे मारू नका तर मैत्रीपूर्ण वागा.

कायदा तुमच्यासोबत आहे : तुम्ही दीर्घ काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल आणि तुम्हाला मूल असेल आणि तरीही तुमचा जोडीदार तुमच्या मर्जीशिवाय तुम्हाला सोडू इच्छित असेल तर तुम्ही कायद्याचा आधार घेऊ शकता. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये असा निकाल दिला आहे की लिव्ह इनमुळे जन्माला आलेले मूल अनावरस समजता येणार नाही. तुम्ही सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत मुलांच्या उदरनिर्वाहासाठी पोटगी देण्याची याचिका दाखल करू शकता. कारण दीर्घ काळपर्यंत लिव्ह इनच्या नात्यात राहिल्याने तुम्हाला कायदेशीरपणे पत्नीचा दर्जा मिळतो.

जोडीदाराने मारहाण किंवा जबरदस्ती केल्यासही तुम्ही न्यायालयात घरगुती हिंसा कायद्याअंतर्गत न्याय आणि उदरनिवार्हासाठी पोटगी मागू शकता. किंवा हिंदू अॅडॉप्शन अँड मेंटनन्स अॅक्टच्या कलम १८ अंतर्गतही याचिका दाखल करू शकता.

भावी जीवनसाथीपासून काही लपवू नका : तुटलेल्या नात्याच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी लग्न चांगला पर्याय आहे. पण लग्नापूर्वी भावी जीवनसाथीला आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबत नक्की सांगा. सोबतच त्याला असा विश्वास द्या की तुम्ही जुने नाते नव्या नात्याआड येऊ देणार नाही.

पुरुषांनीही लक्ष द्या : सहजीवनातून वेगळे होण्याचा परिणाम सर्वाधिक मुलींनाच सहन करावा लागतो हे मान्य, पण संवेदनशील पुरुषांवरही याचा परिणाम होतो हे नाकारता येणार नाही.

जयंतच्या पार्टनरने त्याला सोडल्यानंतर त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. खूप समस्यांचा सामना केल्यानंतर तो यातून सुटू शकला.

दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांत पोलिसांना बलात्काराऐवजी विश्वासघाताचा (क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट) खटला दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पुरुषांनाही न्याय मिळेल.

घाणेरड्या काकांपासून मुलाला वाचवा

– गरिमा पंकज

दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेकडे लक्ष द्या. शाहदरातील विवेक विहार परिसरात ९ वर्षीय मुलीची भाडेकरू छेड काढायचा. निरागस मुलीला हे समजतच नव्हते की तिच्यासोबत काय घडत आहे. तिला ते आवडत नव्हते, पण काही समजतही नव्हते. एके दिवशी जेव्हा वर्गात टीचरने गुड टच आणि बॅड टचबाबत सविस्तर सांगितले, तेव्हा मुलीच्या ते लक्षात आले आणि तिने तिच्यासोबत जे घडले त्याची माहिती दिली. तिने सांगितले की त्यांच्या घरातील भाडेकरू काका तिला कुठेही हात लावतात, जे तिला आवडत नाही. ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी भाडेकरूला अटक केली. अशाप्रकारे एक मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली.

ईस्ट दिल्लीतील शाळांमध्ये ऑगस्ट, २०१८ पासून जानेवारी, २०१९ पर्यंत बलात्कार आणि विनयभंगाच्या २०९ घटना समोर आल्या. मुलांसोबत लैंगिक शोषणाच्या घटना घरात, बाहेर, शाळेत, शेजारीपाजारी कुठेही घडू शकतात. काही मुले तर अशी असतात जी लैंगिक अत्याचारानंतर लाजेने किंवा मार मिळेल या भीतिने कोणाला काहीही सांगत नाहीत. बहुसंख्य घटनांमध्ये शोषण करणारी व्यक्ती तिच असते जिच्यावर मुलाच्या घरातल्यांचा पूर्ण विश्वास असतो. सुमारे ३० टक्के गुन्हेगार बाहेरचे असतात आणि ६० टक्के कुटुंबातील मित्र, बेबीसीटर, शिक्षक किंवा शेजारी असतात.

भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुलांसोबत लैंगिक गैरवर्तनाच्या घटना मुख्यत्वे ५ आणि १२ वर्षांच्या वयात घडतात. त्यावेळी ते आपली वेदना सांगू शकण्याइतके सक्षम नसतात, कारण प्रेम आणि शोषण यात फरक करण्याची समज या वयात नसते. यामुळेच मुलांच्या बाबतीतील बहुतांश गुन्हे समोर येत नाहीत आणि ते सिद्धदेखील होऊ शकत नाहीत. यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत जाते.

उत्तम जोडीदार कसा असेल

* निशा रॉय

आजच्या काळात एका विश्वासू जोडीदाराची साथ मिळणे याचा अर्थ आहे की तुम्ही अतिशय नशीबवान आहात, कारण असा जोडीदार मिळणे विरळाच आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. जर तुम्हाला विश्वासू जोडीदार मिळाला असेल तर तुम्ही त्याचा विश्वास कायम राखण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तो नेहमी तुमच्यासोबत राहिल. एका खऱ्या बॉयफ्रेंडचा अर्थ आहे की तो तुमची काळजी घेईल, या जाणून घेऊ की एखादा विशेष जोडीदार असल्यास तुमचे जीवन कसे आनंदी होते ते.

जो तुमची काळजी घेईल

जर तुमचा बॉयफ्रेंड चांगला आणि विश्वासू असेल तर तो तुमच्याबाबत नक्की विचार करेल आणि तुमची काळजी घेईल. जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला स्पेशल वागणूक देईल. तो तुमच्या भावनांचा विचार करेल, तुमच्या आईवडिलां व्यक्तिरिक्त फक्त तुमचा जोडीदारच तुम्हाला अशी जाणीव करून देतो की तुम्ही सगळयात वेगळया आहात. जोडीदारासोबत असताना तुम्हाला वाटेल की जणू तुमच्या आसपास असे कोणी आहे की ज्याच्या सहवासाने तुम्हाला कशाचीही काळजी करायची गरज नाही.

तो तुम्ही खास आहात याची जाणीव करून देतो

एक चांगला जोडीदार तुम्हाला नेहमी खुश ठेवायचा किंवा तुम्ही कायम आनंदी राहावं यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येक लहानसहान प्रसंगात तुम्हाला सरप्राईज देऊन खुश करतो. मग भले तो तुमच्यापासून दूर असो की तुमच्या जवळ असो. तो कायम तुमच्यासाठी असे काही करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे तुम्ही खास आहात याची तुम्हाला जाणीव होईल.

तुमच्या प्रत्येक दु:खात तो तुमच्या पाठीशी असेल

एक सच्चा जोडीदार नेहमी तुमचा ताण,   दु:ख आणि चिंता दूर करण्याचा आणि तुमची ओंजळ कायम सुखाने भरलेले राहिल असा प्रयत्न करतो. तुमच्या दु:खातसुद्धा तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे तुम्ही तुमचे दु:ख विसरून जाल. मग यासाठी तो तुम्हाला एखादा जोक ऐकवतो किंवा तुम्हाला मिठी मारतो. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तेव्हा तुमचा आधार बनून तुमच्यासोबत उभा राहिल. त्याच्यासोबत असताना तुम्ही प्रत्येक दु:ख आणि काळजी विसरता.

तुमच्याकडे विशेष लक्ष देतो

एक चांगला जोडीदार तुमच्यासोबत नेहमी असे काही क्षण व्यतित प्रयत्न करतो, जे तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरतील. नेहमी तुम्हाला उत्तोमत्तम ठिकाणी फिरायला नेऊन तुम्हाला खास जाणीव करून देतो.

यासोबतच भविष्याबाबतसुद्धा विचार करेल

एक चांगला आणि विश्वासू जोडीदार नेहमी भविष्याबाबत योजना आखेल. प्रत्येक अशा गोष्टीशी संघर्ष करेल, जी तुम्हाला त्याच्यापासून वेगळे करायचा प्रयत्न करत करेल.

वैवाहिक जीवन सुखी बनवण्याच्या ११ पद्धती

* पूनम मेहता

तुम्ही तुमच्या नातेसंबंधांबाबत नेहमीच चिंतित असता का? जर याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. तुमच्या चिंतेचे कारण तुमचा अॅटिट्यूड किंवा दोघांची केमेस्ट्री असू शकते. अशावेळी काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन सुरळीतपणे व्यक्तित करू शकता :

1. संवाद : आपल्या भावना, विचार, समस्या एकमेकांना सांगा. तसेच आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दल बोला. समोरच्याला आपल्या योजनांबद्दल सांगा. बोलण्यासह ऐकणे हे तेवढेच गरजेचे आहे. मौन हा देखील एकप्रकारचा संवाद आहे. आपले हावभाव, स्पर्श यांतून आपल्या साथीदाराप्रति प्रेम आणि आदर दिसून येतो.

2. सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा अट्टाहास नको : जर तुम्ही तुमच्या साथिदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवत आहात तर तुमचे निराश होणे सहाजिक आहे. पार्टनरकडून तेवढयाच अपेक्षा ठेवा, जेवढया तो पूर्ण करू शकतो. बाकी अपेक्षा दुसऱ्याप्रकारे पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा. पार्टनरला स्पेस द्या. त्याच्या चांगल्या-वाईट गुणांना स्वीकारा.

3. विवादापासून लांब राहू नका : निरोगी नात्यासाठी विवाद हे चांगलेही ठरतात. गोष्टींना टाळत राहील्याने राईचा पर्वत होतो. मनातील गोंधळ वाढवू नका, बोलून टाका. तुमचा साथीदार तुमच्याशी वाद घालत असेल तर तुम्ही शांत राहू नका आणि वाईट प्रकारे प्रतिक्रियाही देऊ नका. लक्षपूर्वक ऐका आणि व्यवस्थित समजून घ्या. मारहाण किंवा अपशब्दांचा प्रयोग तर अजिबातच करू नका.

4. चूकीच्या व्यवहाराला आव्हान द्या : कधीच साथिदाराच्या चूकीच्या व्यवहाराने दु:खी होऊन आपला स्वाभिमान गमावू नका. अनेकदा आपण साथिदाराच्या व्यवहाराने एवढे हैराण होतो की आपली वेदना व्यक्त न करता स्वत:लाच अपराधी समजू लागतो. साथीदार शारीरिक मानसिक रुपाने दुखापत देतो. तरीही तुम्ही त्याला नाही म्हणत नाहीत. हे चूकीचे आहे. चूकीचा व्यवहार स्वीकारू नका. यामुळे नात्यात अशी काही फूट पडते जी कधीच भरून निघत नाही.

5. एकमेकांना वेळ द्या : एकमेकांसमवेत वेळ घालवणे आणि क्लालिटी टाईम शेअर केल्याने प्रेम वाढते. साथीदारासह ट्रिप प्लॅन करा, घरातही मोकळे क्षण एकत्र घालवा. यावेळी फक्त चांगले क्षण आठवा, रागाचे विषय काढू नका. मग पाहा जेव्हा कधी तुम्ही हे क्षण आठवाल तेव्हा तुम्हाला छान वाटेल.

6. विश्वास ठेवा आणि मान द्या : तुम्ही तुमच्या साथीदाराची खूप मस्करी करता का? तुम्ही साथिदारावर सतत संशय घेता का? जर असे असेल तर नाते संबंधात सहजता असणार नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि एकमेकांचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे असते. विश्वास आणि आदर कोणत्याही नात्याचा आधार असतो. म्हणूनच यास मजबूत ठेवले पाहिजे.

7. टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका : लग्न झाल्यानंतरही टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नये. साथिदाराच्या आवडी-निवडींवर खरे उतरण्याचा प्रयत्न करा. जसे रोपटयाला व्यवस्थित पाणी देऊन वाढविल्यानंतरच त्याचे भक्कम वृक्ष तयार होतात, योग्य देखभालीने त्याची चांगली वाढ होते. तसेच वैवाहिक जीवनाला दोन लोक मिळूनच सफल बनवू शकतात.

8. हे टिम वर्क आहे : पति-पत्नी तेव्हाच आनंदी जीवन जगू शकतात, जेव्हा दोघे टीमप्रमाणे काम करतील. दोघांनी समजून एकमेकांविरोधात जिंकण्यापेक्षा दोघांनी एकत्रितपणे जिंकणे जरुरी आहे. सुखी वैवाहिक जीवन हा दोघांच्याही मेहनतीचा परिणाम असतो.

9. एकमेकांची काळजी घेणे : जीवनात प्रत्येक गोष्टीच्या वरती एकमेकांना ठेवले तर मनात सुरक्षेची भावना निर्माण होईल. ही भावना नात्याला मजबूत बनवेल. प्रत्येक पति-पत्नीला एकमेकांकडून भरपूर प्रेम आणि आदर हवा असतो.

10. लक्षपूर्वक मित्र निवडा : तुमचे मित्र तुमचे जीवन बनवू किंवा बिघडवू शकतात. मित्रांचा प्रभाव तुमच्या व्यक्तित्वावर आणि व्यवहारावर अधिक असतो. म्हणूनच असे मित्र निवडा, जे तुमच्यासाठी चांगले असतील.

11. बोलण्यावर संयम : वैवाहिक जीवनात अनेकदा तुमचे बोलणे तुमच्या विवाहाला नष्ट करून टाकतात. आपल्या शब्दांचा प्रयोग कटाक्षाने करा. चांगले शब्द वापरा, समजवा, कौतुक करा, यामुळे तुमचे वैवाहिक जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत होईल.

लिव इन पोकळ नातं

* गरिमा पंकज

लिव इन हे आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार तरुणांनी निर्मित केलेली थोडी कमी आजमावलेली कॉन्सेप्ट आहे. मुलामुलीची विवाहित जोडप्याप्रमाणे सोबत राहाण्याची व्यवस्था म्हणजे लिव इनमध्ये वैवाहिक जीवनातील आकांक्षा पूर्ण होतात, एकमेकांचा सहवासही लाभतो परंतु दीर्घकालीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते बांधील नसतात. कधीही विलग होण्याचं स्वातंत्र्य असतं. ही कॉन्सेप्ट विवाह करण्याची मानसिकता नसणाऱ्यांना वरकरणी आकर्षक भासते, परंतु आतून तितकीच पोकळ आणि अस्थिर तर आहेच शिवाय त्यातही अनेक जबाबदाऱ्या आहेत. कदाचित हेच कारण आहे की बहुतेक जण खासकरून मुली आजही याचा स्वीकार करत नाहीत.

अपूर्णतेची जाणीव

एक प्रकारे हे नातं धार्मिक मान्यतांच्या बंधनापासून सामाजिक रुढीपरंपरा आणि शोबाजीच्या रंगापासून दूर आहे आणि कायद्यानेसुद्धा याला काही मर्यादेपर्यंत मान्यता दिली आहे. परंतु तरीदेखील या नात्याच्या अपूर्णतेला दुर्लक्षित करता येणार नाही खासकरून मुली अशाप्रकारच्या नात्यांमध्ये अनेकदा गहिऱ्या मानसिक त्रासातून जातात.

वास्तविक, लिव इनमध्ये नातं जेव्हा गहिरं होतं आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात, शारीरिकसंबंध साधतात, तेव्हा ती भावना मुलीच्या मनात कायम सोबत राहाण्याच्या इच्छेला जन्म देते. ५० मिनिटांची जवळीक ५० वर्षांच्या सहवासाच्या इच्छेमध्ये बदलू लागते. परंतु जरुरी नाही की मुलगासुद्धा याच पद्धतीने विचार करेल आणि जबाबदाऱ्या पूर्ण करायला तयार होईल.

बहुतेक प्रकरणांमध्ये या गोष्टीवरून नातेसंबंध तुटतात आणि अखेरीस शारीरिक प्रेमावर आधारीत हे नातं आयुष्यभराचं दुखणं बनून राहातं. अनेकदा या दुखण्यातून निर्माण झालेली वेदना इतकी त्रासदायक असते की मुलगी स्वत:ला संपवून टाकण्यासारखं चुकीचं पाऊल उचलायलाही मागेपुढे पाहात नाही.

अशा नातेसंबंधांमध्ये प्रेम कमी वाद अधिक

अशा नातेसंबंधांमध्ये मुलामुलींचा एकमेकांवर पूर्ण हक्क नसतो. ते संयुक्त निर्णयसुद्धा घेऊ शकत नाहीत. जसं की, विवाहित दाम्पत्य मात्र घेतात. उदाहरणादाखल संपत्ती एक तर मुलाची असते वा मुलीची. दोघांचा अधिकार नसतो. दुसऱ्याला हे विचारण्याचा अधिकार नाही की पैसे कशाप्रकारे खर्च होत आहेत. दोघे आपले पैसे आपल्या मर्जीने खर्च करतात.

याच कारणामुळे बहुतेकदा यांच्यात हक्क आणि अधिकारावरून भांडणं होत राहातात. हा वाद सहजासहजी मिटत नाही. ते प्रयत्न करतात की प्रेम दर्शवून वा आपसांत बोलून वाद मिटवावा. परंतु बहुतेकदा असं होत नाही; कारण कोणतेही नातेसंबंध कायम राखण्यासाठी आणि दोन व्यक्तींना जवळ ठेवण्यासाठी जे गुण सर्वाधिक जरुरी आहेत ते आहेत, विश्वास, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आत्मिक निकटता.

हे गुण विकसित करण्यासाठी वेळ हवा असतो. केवळ भौतिक वा शारीरिक जवळीक मानसिक आणि भावनिक आधार देईल असं जरुरी नाही. अशा पोकळ नात्यांमध्ये कटुतेचा काळ सहजी संपत नाही.

जबाबदाऱ्यांपासून पळायला शिकवतं लिव इन

लिव इन रिलेशनशिप ही वास्तविक भावनिक बंधनांच्या आधारेसोबत राहाण्याची एक व्यक्तिगत आणि आर्थिक व्यवस्था आहे. यामध्ये कायमस्वरूपी एकमेकांना सोबत देण्याचं कोणतंही आश्वासन नसतं, शिवाय संपूर्ण समाजकायद्यासमोर अशाप्रकारचा कोणताही करार केला जात नाही. त्यामुळे पार्टनर्स एकमेकांवर (लेखी/तोंडी) कोणत्याही प्रकारचा कसलाही दबाव आणू शकत नाहीत. असं नातं एकप्रकारे रेंटल एग्रीमेंटसमान असतं. हे अतिशय सहजतेने बनवलं जातं. आणि जोपर्यंत दोन्ही पक्ष योग्य वर्तन करतात, एकमेकांना खूश ठेवतात तोपर्यंत ते सोबत असतात. याउलट विवाह या पार्टनरशिपहून अधिक गहिरा आहे. हा एक सार्वभौमिक पातळीवर केलेला करार आहे, ज्यासोबत कायदेशीर आणि सामाजिक जबाबदाऱ्या संबंधित असतात. वास्तविक लग्न केवळ २ व्यक्तिचं, २ कुटुंबांचं व समुदायांमध्ये बनलेलं नातं आहे, जे आयुष्यभरासाठी स्वीकारार्ह आहे. जीवनात कितीही दु:ख, समस्या आल्या, तरी परस्पर नातं जपण्याचं आश्वासन यात दिलं जातं.

असं म्हटलं जातं की, हृदयाच्या तारा जुळल्या की मग रीतिरिवाजांची काय गरज? परंतु मुद्दा इथे रीतिरिवाजाचा नाही तर सामाजिक स्तरावर केलेल्या कमिटमेंटचा आहे. कायम जबाबदारी घेण्याची कमिटमेंट, नेहमी साथ निभावण्याची कमिटमेंट, विवाहामध्ये एका वेगळ्या पातळीची कमिटमेंट असते, त्यामुळे एका वेगळ्या पातळीवरील संरक्षण, स्वातंत्र्य आणि परिणामी वेगळ्या पातळीवरील आनंदही यातून मिळतो. जे नातं केवळ परस्पर प्रेम आणि आकर्षण कायम आहे तोपर्यंत निभावलं जातं, त्यापासून हे नातं खूप निराळं आहे. त्या संबंधात उत्तम पर्याय मिळताच विलग होण्याचा मार्ग खुला असतो. कायम मानसिक तयारी ठेवावी लागते की हे नातेसंबंध कधीही संपुष्टात येऊ शकतात.

समर्पण हवं तर लिव इन नको

जेव्हा समर्पणाचा विषय येतो, तेव्हा विवाहित जोडीदार या दृष्टीने अतिशय प्रामाणिक आढळून येतात. ५ वर्षांच्या एका संशोधनानुसार ९० टक्के विवाहित स्त्रिया पतिव्रता असल्याचं आढळलं, याउलट लिव इनमध्ये असणाऱ्या केवळ ६० टक्के स्त्रियाच प्रामाणिक होत्या असं आढळलं.

पुरुषांच्या बाबतीत स्थिती अधिकच आश्चर्यकारक होती. ९० टक्के विवाहित पुरुष आपल्या पत्नीप्रती प्रामाणिक होते. याउलट लिव इन प्रकरणात अवघे ४३ टक्के पुरुषच प्रामाणिक आढळले.

इतकंच नव्हे, लिव इनचं संकट म्हणजे प्रीमॅरिटल सेक्श्युअल एटीट्यूड आणि वर्तन विवाहानंतरही बदलत नाही. जर एक स्त्री लग्नापूर्वी एका पुरुषासोबत राहात असेल तर बऱ्याच प्रमाणात शक्यता असते की ती विवाहानंतरही आपल्या पतीला धोका देईल.

संशोधन व अभ्यास अहवालांनुसार जर एखादी व्यक्ती विवाहापूर्वी सेक्सचा अनुभव घेते, तर विवाहानंतरही ती व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये गुंतेल अशी सर्वाधिक शक्यता असते. हे खासकरून स्त्रियांसाठी अधिकीने सत्य आहे

पालकांपासून अंतर

लिव इनमध्ये राहाणाऱ्या मुलामुलींच्या जीवनात सामान्यत: आईवडिलांचा हस्तक्षेप नाममात्र असतो; कारण यासाठी त्यांची संमती नसते आणि ते आपल्या मुलांपासून अंतर राखतात.

घरच्यांना या गोष्टीची माहिती त्यांनी दिली नाही, तरी हे रहस्य अधिक काळ लपवून ठेवणंही सोपं नसतं. अनेक प्रकारच्या गोष्टी जसं की आईवडिलांकडून पैशांची मदत घेणं, पार्टनर आणि त्याचं सामान लपवणं जेव्हा पालक अचानक भेटायला येतात, सातत्याने त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचा अपराधभाव आणि खोटं बोलणं यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या लिव इनमध्ये राहाणाऱ्यांना अस्वस्थ करतात.

विश्वासाचा अभाव

जे विवाहापूर्वी सोबत राहातात, त्यांच्यात बऱ्याचदा अविश्वासाची भावना विकसित होते. परिपक्व प्रेमामध्ये गहिरा विश्वास असतो की तुमचं प्रेम केवळ तुमचं आहे आणि कुणी तिसरं त्यात नाही. परंतु विवाहापूर्वीच जवळीक साधल्यावर व्यक्तिच्या मनात अनेक प्रकारचे संशय निर्माण होऊ लागतात की माझ्यापूर्वी तर जोडीदाराच्या जीवनात कुणी नव्हतं ना वा माझ्याशिवाय भविष्यात दुसऱ्या व्यक्तीसोबत याचे संबंध बनणार नाहीत ना.

अशाप्रकारचा अविश्वास आणि संशयीवृत्ती बळावल्याने व्यक्ती हळूहळू आपल्या पार्टनरप्रती प्रेम व सन्मान गमावू लागतो. याउलट वैवाहिक जीवनात विश्वास एक महत्त्वपूर्ण भाग असतो.

एकटा जीव सदाशिव

– सुमन बाजपेयी

‘‘बिचारी ३५ वर्षांची झाली. पण अजून सिंगल आहे.’’

‘‘दिसायला तर सुंदर आहे. मोठी अधिकारी आहे. काय माहीत अजून लग्न का नाही झालं?’’

सोमा आपल्या सोसायटीत शिरताच हे शब्द तिच्या कानावर पडले. खरंतर या गप्पा तिच्यासाठी नवीन नव्हत्या. तिला आता याची सवय झाली होती. पण तरीही कधीकधी तिला या गोष्टींचा त्रास व्हायचा. लोक तिच्या आयुष्यात हस्तक्षेप का करतात? तिला तिचं आयुष्य शांततेने जगू का देत नाहीत? तिच्या प्रत्येक हालाचालीवर लक्ष ठेवलं जातं. जसं काही सिंगल असणं हा गुन्हाच आहे. तिने स्वत:हून असं

आयुष्य निवडलं असेल तर समाजाला याचा त्रास का होतो? तिचं तर सगळं छान चाललंय.

आपल्या मोठ्या बहिणीचं फसलेलं लग्न पाहूनच सोमाने एकटं राहण्याचा निर्णय घेतला. किती बंधनं आहेत तिच्यावर. कोणतंही काम ती आपल्या पतीच्या परवानगीशिवाय करू शकत नाही. सोमाने रीनाला निरखून पाहिलं. पस्तीशीतही ती साठीतली दिसत होती.

सोमासारख्या सिंगल विमेन आजकाल कमी नाहीत. कारण त्या आपल्या मर्जीने लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगायचं आहे. मग एखादवेळेस लग्न नाही जरी झालं तरी एकटयाने आनंदात जगता येतं. पण जगण्याची पद्धत माहीत असायला हवी.

सोमा म्हणते, ‘‘लग्न झालंच पाहिजे असं काही नाही. काहीवेळा असं होतं की इच्छा असूनही योग्य जोडीदार न मिळाल्याने तुम्ही लग्न करू शकत नाही. कोणी आवडलंच तरी त्या व्यक्तिसोबत संपूर्ण आयुष्य काढता येण्याची खात्री नसते. माझ्यासोबतही

असंच काहीसं झालं. हे खरं आहे की प्रेम हा एक सुंदर अनुभव आहे. पण तुम्हाला कोणी जोडीदार मिळाला नाही तर त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही सुखी नाही. फक्त समाजाला तसं वाटत असतं. तुम्ही सिंगल असाल तर तुमचं आयुष्य अपूर्ण आहे असं मानणं चुकीचं आहे. लग्न म्हणजेच सर्वस्व नाही. आयुष्यात अनेक शक्यता असतात. फक्त त्या शोधणं आणि त्यांचा योग्य वापर करणं जमलं पाहिजे.’’

तुमचे मित्र, नातेवाईक, आईवडिल, भावंडं आणि समान यांना कायम असं वाटतं की तुम्ही सिंगल आहात म्हणजे तुम्ही दु:खी आहात. त्यामुळे ते तुम्हाला सेटल होण्याचा सल्ला देतात. तुम्हाला लग्न करायचं नसेल किंवा तुमच्या एकटं राहण्याचं कारण काहीही असलं तरीही तुम्ही हेच मानून चाला की तुम्ही एकट्यानेही खूश राहू शकता. एकटं राहण्याचा निर्णय तेव्हाच घ्या, जेव्हा तुमच्या मनाची पूर्ण तयारी असेल.

बंधनमुक्त होण्याचा आनंद लुटा : लग्न झालं म्हणजे तुम्ही सुखीच राहाल असं काही नाही. जबाबदाऱ्यांसोबत अडचणीही आपोआप येतात. सिंगल असाल तर ना

कोणती जबाबदारी, ना कसली कमिटमेंट. मग आयुष्य साजरं करा. एखाद्या कपलला हातात हात घालून बसलेलं पाहून नाराज होऊ नका. स्वत:साठी जगा आणि मोकळा श्वास घ्या. सिंगल स्टेटसचा त्रास करून घेण्यापेक्षा तुमच्यावर कोणंतंही बंधन नाही याचा आनंद माना, तुम्ही कधीही कुठेही येऊजाऊ शकता. यासाठी फक्त स्वत:मध्ये आत्मविश्वास बाळगा आणि लोकांचं बोलणं ऐकून दु:खी होणं किंवा काही प्रतिक्रिया देणं बंद करा.

स्वत:ला वेळ द्या : तुम्हाला स्वत:साठी खूप वेळ मिळेल. विवाहित स्त्रियांच्या मनात जी अपराधीपणाची भावना असते, ती तुमच्या मनात नसेल. नवरा, मुलं, घर-कुटुंब यामुळे महिलांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. पण सिंगल असण्याचा फायदा हा आहे की तुम्ही स्वत:ला वेळ देऊ शकता. सजा, फिरा आणि आवडतं गाणं ऐका वा पुस्तक वाचा. कोणी अडवणार नाही. शिवाय एकटेपणाची भावना मनात डोकावणारही नाही. स्वत:ची ओळख करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि स्वत:ला घडवता येतं. कोणती आशा-अपेक्षा नसल्याने विरोधाभास, हेवा यांना स्थान नसते.

सोशल व्हा : स्वत:चं सोशल सर्कल बनवा. हे आवश्यक आहे कारण कंटाळा आला की पार्टीला किंवा रेस्टॉरन्टमध्ये जाता येईल. कितीही सोशल झालात तरी कोणावरही अवलंबून राहू नका की कोणी सोबत आलं तरच सिनेमा बघायला जाल किंवा लंचला जाल. कोणाच्या सोबतीची कशासाठी अपेक्षा ठेवायची? पण तरीही आपला आवाका कशासाठी वाढवत राहा. जेणेकरून गरजेच्यावेळी नि:संकोचपणे मदत मागता येईल.

संपूर्ण लक्ष करिअरवर द्या : सिंगल असाल तर करिअरवर व्यवस्थित लक्ष देऊ शकता. मेट्रो सिटीमधल्या मुली करिअर करण्यासाठी आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकटं राहणंच पसंत करतात.

एका एमएनसीमध्ये काम करणारी ३७ वर्षीय अनुभा सांगते, ‘‘मी ठरवून लग्न केलं नाही. मी सुरूवातीपासूनच माझ्या करिअरबाबत आग्रही होते आणि मला माहीत होतं की लग्नानंतर तडजोड करावी लागेल. कदाचित नोकरी सोडावी लागेल. मधे ब्रेक घेतल्याने करिअर ग्राफवर परिणाम होतो आणि प्रत्येकवेळी नव्याने सुरूवात

करावी लागते. आधीची मेहनत वाया जाते. त्यामुळे मी माझं सगळं लक्ष करिअरवर केंद्रित केलं आणि आज मी यशस्वी आहे. माझ्या या यशाचा मी संपूर्ण आनंद घेते.’’

सिंगल वूमन करिअरमध्ये जास्त यशस्वी असतात हे आता सिद्ध झालं आहे आणि आजकाल खासगी कंपन्या त्यांनाच प्राधान्य देत आहेत. कारण त्या कामासाठी जास्त वेळ देतात आणि जास्त फोकस्ड असतात. त्या मन लावून काम करतात.

छंद जोपासा : सिंगल असाल तर संपूर्ण वेळ तुमचा असतो आणि यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. बागकाम करा, बाइक चालवा किंवा गेम्सखेळा. तुम्ही हवं ते करू शकता, कोणाच्याही हस्तक्षेपाविना. कोणी असं म्हणणार नाही की हे काय वय आहे का हे सगळं करायचं? पेंटिंग करा किंवा एखादा कोर्स करा. तुम्ही एखादा तरी छंद जोपासू शकाल. स्वत:ला नवनव्या गोष्टींबद्दल अपडेट ठेवा.

आपल्या मनाचं ऐका : सायकलिंग टे्रकिंग करा. वीकेंडला लाँग राइड्सवर जा किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणं

हेच तुमचं ध्येय असायला हवं. तुम्हाला लोकांनाही हेच दाखवायचं आहे की सिंगल असूनही तुम्ही किती खूश आहात.

सोलो ट्रिपवर जा : फिरायला कोणाला नाही आवडत? कोणी अडवलंय तुम्हाला? निघा, आपल्या आवडत्या ठिकाणी, तुम्हाला हवं तसं ट्रेकिंग करायला किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये आराम करायला. खरंच तुम्हाला मजा येईल. हे नक्की करू, ते नक्की करू, अशी कसलीच किटकिट नाही. म्युझिक फेस्टिव्हलला जा किंवा नाटक पाहा. कोणीही अडवणार नाही. विवाहित महिला हे सगळं करण्याचा विचारही करू शकत नाहीत.

खरेदी करा : तुम्ही कमवत असाल तर स्वत:वर खर्च करा. स्वत:च्या पैशांनी खरेदी करण्याची मजाच वेगळी असते. स्वत:वर पैसे खर्च करताना कोणता अपराध भाव मनात नसेल, जे हवं ते खरेदी करू शकता आणि काही खरेदी करण्यासाठी कोणाचाही दबाव नसेल. जे आवडेल ते खरेदी करण्याची मोकळीक असेल. सतत इतर कुणाची तरी किंवा नवऱ्याची परवानगी घेण्यापेक्षा आपल्या मर्जीनुसार खा-प्या आणि मजा करा.

तडजोड नको : तुम्हाला कोणासाठीही आपल्या आनंदात तडजोड करावी लागणार नाही, लोक तुम्हाला स्वार्थी म्हणू शकतात. पण यात वाईट काय आहे. थोडं स्वार्थी असण्याचीही गरज आहे. कारण आयुष्य तडजोडीच्या चक्रात अडकते तेव्हा सुख कमी  दु:खच जास्त जाणवते. कुढत जगण्याचा काय फायदा? स्वत: निर्णय घ्या. अखेरीस तुमचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून का असावा? आयुष्य मोकळेपणाने जगा.

दांपत्य जीवनातील ९ वचनं

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

बदलत्या काळाबरोबर बदलही आवश्यक आहे. आजच्या युगात दांपत्य विशेषकरून नवविवाहित जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आपल्या भावना आणि विचारांचा अंदाज थोडा बदलायलाच हवा. पूर्वी विवाहाचा अर्थ फक्त प्रेम आणि त्याग होता, ज्यात बहुतेकदा स्त्रियाच पती आणि त्याच्या घर-कुटुंबासाठी समर्पित राहण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानत असत आणि त्याग व कर्तव्याची मूर्ती बनून सारे जीवन आनंदाने व्यतित करायच्या. घरकुटुंबात यामुळेच त्यांना सन्मानही मिळत असे.

पुरुष पण अशी पत्नी मिळाल्याने आनंदीत व्हायचे. त्यांची मानसिकताही स्त्रियांप्रति हीच होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही ही गोष्ट समजली आहे. आज स्त्रियाही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, प्रगती साधत आहेत.

वर-वधू लग्नाच्या वेळेस रीती-रिवाजाच्या नावावर ७ वचने घेतात आणि बहुतेक खूप लवकर विसरूनही जातात.परंतु दांपत्य सर्वेक्षणाच्या आधारावर निष्कर्षाच्या रूपातील या वचनांचा विवाहानंतरही स्विकार करा, यांना लक्षात ठेवा आणि निभवासुद्धा. दोघांनाही एकमेकांच्या कामात सहकार्याच्या रूपाने ताळमेळ बसवून चालण्याची आवश्यकता आहे, ज्यातून सगळयांच्या विचार-विमर्शातून निघालेली ही खालील वचने मोठया कामाची आहेत :

  1. जे माझे आहे ते तुझेही : लखनौऊचे आर्किटेक्ट सुहास आणि त्यांची पत्नी सीमामध्ये सुरुवातीला छोटया-छोटया गोष्टींवरून नेहमी भांडणे होत. सीमा म्हणते, ‘‘जसे माहेरून मिळालेल्या महाग बेड कव्हर, क्रॉकरी इत्यादीचा जेव्हा सुहास आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी उपयोग करायचे, तेव्हा मला अजिबात आवडायचे नाही. त्याचप्रमाणे त्यांनाही माझे नातेवाईक, मैत्रिणींद्वारे त्यांचे म्युझिक सिस्टम किंवा पुस्तके हाताळणे एकदम असह्य व्हायचे. नंतर एके दिवशी आम्ही ठरवले की जर आपण एक आहोत तर एकमेकांच्या वस्तूंचा उपयोग का नाही करायचा. त्यादिवसापासून सगळा परकेपणा दूर झाला.
  1. जसे मला आपले आई-बाबा,भाऊ-बहिण,मित्र-नातेवाईक प्रिय आहेत, तसेच तुम्हालाही आपले :
  • जयपुरचे डॉ. राजेश आणि त्यांची होममेकर पत्नी इशाने या गोष्टीचा खुलासा केला की पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा घरात समान आदर होणे आवश्यक आहे. राजेशने आपली बहिण रिमाच्या घरी आपली व आपल्या आई-बाबांची पुन्हा-पुन्हा अपमानित होण्याची घटना सांगितली. बहिण आपल्या पतिकडून होणाऱ्या अपमानजनक व्यवहारामुळे दु:खी असायची. यामुळे त्यांचे आपसातील नाते कधी गोड झाले नाही. ही तर चुकीची अपेक्षा आहे की फक्त पत्नीने पतिच्या घरच्यांचे प्रेमाने स्वागत करायचे आणि पतिने तिच्या माहेरच्या लोकांचा आदर न करता जेव्हा-तेव्हा अपमान करायचा. पतिचेही तेवढेच कर्तव्य आहे. पत्नी अर्धांगिनी आहे, जीवनसाथी आहे, गुलाम नाही.
  1. जशा माझ्या गरजा आवश्यक तशाच तुमच्याही : सुजाता एका कॉर्पोरेट ऑफिसात काम करते. नेहमी तिला घरी येण्यास उशीर होतो. घरी असतानाही तिला कधी-कधी ऑफिसचे काम करावे लागते. यावर पती विशाल चिडचिड करत असे. एके दिवशी सुजाताने त्याला बसवून चांगल्याप्रकारे समजावले की विशाल मी लग्नाच्या अगोदरच तुम्हाला सांगितले होते, तेव्हा तर तुम्हाला माझ्या चांगल्या पॅकेजपुढे सर्व स्वीकार होते. जेव्हा तुम्ही आपल्या बिझनेस मीटिंगमधून उशिरा येता तेव्हा तर माझी काही हरकत नसते. तर मग तुम्ही का समजून घेत नाही? मी नोकरी सोडू शकत नाही. आईचे प्रत्येक महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन मी थांबवू शकत नाही. नि:संदेह तुम्ही मला सोडू शकता. माझी यालाही काही हरकत नाही. मी डिवोर्ससाठी तयार आहे. मी उद्याच दुसरीकडे कोठे शिप्ट होईल.
  2. आपल्या सवयी, छंद, संस्कार जसे माझे तसेच तुमचे : पती-पत्नी वेगवेगळया परिवारातून, वेगवेगळया वातावरणातून येतात पण दुसऱ्याकडून आपल्यासारखे आचरण व राहणीमानाची अपेक्षा करतात किंवा वेगळे पाहून टर उडवतात तर हे योग्य नाही, त्यापेक्षा याचे समाधान शोधणे योग्य असते. स्कूल टीचर दीप्ती आपल्या बँक मैनेजर पती शिखरला अनवाणी पायांनी घरात फिरल्यानंतर अंथरुणात घुसण्याने वैतागत असे. तर शिखर तिचे बाहेरून कोठून आल्यावर कपडे चेंज करून अंथरुणावर टाकणे पसंत नव्हते. शेवटी एके दिवशी बसून दोघांनी समस्येचे समाधान शोधले. आता पायांच्या अस्वच्छतेपासून वाचण्यासाठी शेखरने कार्पेट अंथरले तर दीप्तीनेही शिखरचे बघून कपडे व्यवस्थित हँग करायला सुरूवात केली. त्यांचे जीवन पुन्हा सुरेल सुरावट बनली.
  3. दुसऱ्यांच्या समोर एकमेकांचे दोष किंवा टर उडवायची नाही : दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील माला पहिल्यांदा विवाहानंतर विमानयात्रा करत होती. पती अंश व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याचा एक मित्रही पत्नीसहित त्यांच्याबरोबर होता. सर्व एका तिसऱ्या मित्राच्या लग्नाला जात होते. बेल्ट बांधण्याची सूचना झाली तर मालाने घाईत जवळच्या सीटचा बेल्ट उचलला आणि लावण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून अंश हसू लागला, ‘‘अक्कल चरायला गेली आहे काय? एवढेपण कळत नाही.’’ हे बघून सर्व हसू लागले. तेव्हा मालाला खूप वाईट वाटले. मग ती म्हणाली, ‘‘तुम्हाला हसण्याऐवजी माझी मदत करायला हवी होती किंवा यांच्यासारखी श्रीमंत घरातील पत्नी आणयला हवी होती.’’ अंशला आपली चुक कळाली की त्याने असे बोलायला नको होते.

अशाचप्रकारे बरेली निवासी गीताचे भाऊ-वहिनी तिला भेटण्यासाठी आले. तेव्हा पती दिपक बाटलीनेच पाणी पित होता. त्याने गीताच्या भावालाही तीच पाण्याची बाटली ऑफर केली.

‘‘थांबा, मी ग्लास आणते. आमच्या येथे कोणी अडाण्यासारखे पाणी पित नाही,’’ गीता म्हणाली.

दिपकला तिचे म्हणणे खटकले. म्हणाला, ‘‘आणि आमच्या येथेही पतिशी असे कोणी बोलत नाही.’’

भावाने गीताला टोकले व विषय सांभाळला, नंतर दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटले आणि दुसऱ्यांच्या समोर एकमेकांची टर न उडवण्याचे आणि दोष न काढायचे वचन दिले.

  1. जशी माझी सामाजिक बांधिलकी तशीच तुमचीही : दीपांकरची पत्नी जया लग्नाच्या आधीपासूनच फार सामाजिक होती. सर्वांच्या सुखदु:खात, सणासुदीच्या प्रसंगी सामील होत आली होती. ऑफिस असो किंवा शेजारी, नातेवाईक सगळयांशी मिळून-मिसळून राहायची. आणि अजूनही राहत आहे. दीपांकरही तिला सहकार्य करतो, त्यामुळे जयासुद्धा दीपांकरच्या सामजिक नातेबंधांची काळजी घेते.
  2. जशी मला काही स्पेस हवी तशीच तुम्हालाही : पारुलने सांगितले संपूर्ण दिवस तर ती पती रवीमागे हात धुवून लागत नाही. काही वेळ त्याला एकटे सोडते, जेणेकरून तो आपले काही काम करू शकेल. पतिसुद्धा या गोष्टीची काळजी घेतो की मला स्पेस मिळावी.दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद होत नाही. दुसऱ्या दिवसाचा होमवर्कही सहज होतो. सोबत असल्यावर छान पटतं.
  3. जसे माझे काही सिक्रेट्स न सांगण्यासारखे, माझी इच्छा तशीच तुझीही : लग्नाच्या आधी काय झाले होते पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर वा त्यांच्या घर-कुटुंबात. जर ही गोष्ट कोणी सांगू इच्छित नसेल तर ठीक आहे, खोदून-खोदून का विचारावे? शंकेत वा संभ्रमात राहणे व्यर्थ आहे. कॉलेजचे इंग्रजीचे प्रोफेसर डॉ. नगेंद्र आणि त्यांची हिंदीची प्रोफेसर पत्नी नीलमचे हेच मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नात्याच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. वर्तमान बघावे, एकमेकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवावा.
  4. पॉकेटमनीच्या खर्चावर अडवणूक नको : ‘‘आमच्या दोघांच्या छान जीवनाचा हाच तर सरळ फंडा आहे. घरखर्च आम्ही सहमतीने सारखा शेअर करतो आणि पॉकेटमनीवर एकमेकांना रोखत नाही,’’ स्टेट बँक कर्मचारी प्रिया आणि तिच्या असिस्टंट मॅनेजर पती करणने आपल्या गमतीशीर गोष्टीने अजून एक महत्वाचे वचनही सांगून टाकले. तर मग आता विलंब कशाचा. लग्नाच्या वेळेस ७ वचने घेतली होती, तर लग्नानंतरही पती-पत्नी दोघांनी ही वचनं आत्मसात करावी आणि प्रेमाने हे नाते निभवावे.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें