कोरोना या ७ गोष्टींकडे द्या लक्ष

* प्राची भारद्वाज

कोरोनाचा कहर संपूर्ण जगावर झाला आहे. जवळपास सर्वच देश याच्या फेऱ्यात अडकले आहेत. लोक घरात नाईलाजाने बंदिस्त झाले आहेत. काय करणार? कोरोनापासून स्वत:चे रक्षण करणेही गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाता येणार नाही. साफसफाईकडे लक्ष द्यायचे आहे आणि संसर्गापासून दूर रहायचे आहे. अशावेळी काय होईल, जेव्हा पतीपत्नी किंवा लिवइन जोडप्याला एका घरात पूर्ण वेळ सोबत रहावे लागेल? कशी असेल ती परिस्थिती जिथे पतीपत्नीला जबरस्तीने एकमेकांसमोर रहावे लागेल? लक्षात घ्या, हा हनिमून नाही. संशोधनानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, अशा परिस्थितीत लोकांना प्रचंड हताशा, कंटाळा, एकाकीपण, राग आणि तणावासारख्या भावनांचा सामना करावा लागतो.

जगभरात पतीपत्नीवर केलेल्या विनोदांची कमी नाही. सर्वांना माहिती आहे की, भलेही हे नाते जीवनभराचे असले तरी थोडासा स्वत:साठी वेळ प्रत्येकालाच हवा असतो. म्हणून हेच चांगले असते की, पतीने सकाळी कामाला जावे, पत्नी गृहिणी असेल किंवा नोकरीला जात असेल आणि रात्री उशिरा दोघे एकमेकांना भेटत असतील. यामुळे दोघांना आपापले जीवन जगता येते. शिवाय भेटल्यानंतर कितीतरी नवीन गोष्टी सांगण्यासारख्या असतात, ज्या या नात्यात नव्याने गोडवा आणतात. पण कोरोनामुळे अशी गोड हवेची झळूकही हरवून गेली आहे. ज्या जोडप्यांच्या घरी मुले आहेत तिथे लक्ष दुसऱ्या गोष्टीत वळवणारे इतरही सदस्य आहेत. पण ज्या जोडप्यांना मुले नाहीत तिथे एकमेकांशिवाय दुसरे असणारच कोण?

अशावेळी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे :

  1. दिनक्रम बिघडू देऊ नका

जेव्हा आपल्या सर्वांसमोर घरात राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही, अशावेळी आळशीपणाने प्रत्येक काम टाळू नका. ज्याप्रमाणे यापूर्वी सकाळी उठत होता, तसेच उठा. अंघोळ करुन तयार व्हा. त्यानंतर घरातील कामे उरका. ऑफिसची वेळ होईल तेव्हा जागा निश्चित करून तेथे टेबल आणि खुर्ची घेऊन बसा. लक्षात ठेवा, कोरोनामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर खूपच वाईट परिणाम होत आहे. म्हणूनच आपले काम प्रामाणिकपणे करा.

  1. घरातली कामे आपापसात वाटून घ्या
  • या काळात घरकाम करणाऱ्या महिला, ड्रायव्हर, कार धुणारे, स्वयंपाकी सर्वांनाच सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातली सर्व कामे आपल्यालाच करायची आहेत. अशावेळी कोणा एकावर सर्व कामांची जबाबदारी अली तर त्याची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. अशी वेळ येऊ नये म्हणून घरातल्या कामांची एक यादीच तयार करा. आपली क्षमता आणि आवडीनुसार कामाचे वाटप करा. जसे की, भांडी पतीने घासली तर साफसफाई पत्नीने करावी. जेवण पत्नीने बनवले तर सर्व पुसून घेणे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे, ही कामे पतीने करावीत.
  1. जवळ येऊ नका, दूरही जाऊ नका
  • आज परिस्थिती अशी आहे की, जवळही जाता येत नाही आणि फार दूरही राहता येणार नाही. एकाच घरात एकत्र बंद झाल्यामुळे तरुण जोडप्यांमध्ये एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा तरुण पती किंवा पत्नी समोर असते तेव्हा मनावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. पण सोबतच या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे की, कोरोना विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणूनच जर जवळ आलात तर त्यानंतर स्वत:च्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. अंघोळ करा. तसे तर शॉवरखालीही तुम्ही एकमेकांजवळ येण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकता. म्हणजे प्रेम आणि स्वछता दोन्ही साधता येईल. पण एकत्र राहिल्यामुळे फक्त प्रेम फुलेल, असेही अजिबात नाही. याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
  1. ओव्हर एक्सपोजरचा धोका
  • सतत सोबत राहिल्यामुळे तरुण जोडप्यात केवळ प्रेमच बहरेल असे नाही तर मतभेदही वाढू शकतात. आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोना काळात एकमेकांसोबत राहण्यावाचून पर्याय नसलेल्या जोडप्यांवर घटस्फोटाची वेळ आली आहे. चीनचा दक्षिण-पश्चिम भाग सिशुआनमध्ये 24 फेब्रुवारीनंतर ३०० हून अधिक घटस्फोटाचे अर्ज आले आहेत. दक्षिण चीनमधील फुजीआन प्रांतात तर एका दिवसात घटस्फोटाच्या १० अर्जांवर सुनावणी ठेवण्यात आली. असे यामुळे होत आहे की, तरुण जोडपी गरजेपेक्षा जास्त वेळ नाईलाजाने एकमेकांसोबत घालवत आहेत. त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त काळसोबत राहून अनेकदा त्यांच्यात वाद होतात आणि शेवटी स्वत:चा अहंकार, राग किंवा जिद्दी स्वभावामुळे ते घटस्फोटाचा निर्णय घेतात.
  1. घरात राहूनही अंतर ठेवणे आहे शक्य
  • स्वत:साठी थोडा वेळ असायला हवा असे प्रत्येकालाच वाटते. आपली स्पेस, आपला वेळ. पण सतत सोबत राहिल्यामुळे जोडीदाराची नजर सर्वकाळ आपल्यावरच खिळून राहिल्यासारखे वाटते. हे टाळण्यासाठी तुम्हाला दोघांची स्वत:साठीची वेळ आणि जागा ठरवून घ्यायला हवी. तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर सोबत असूनही एकमेकांपासून थोडे अंतर सहज ठेवू शकता. शिवाय एकमेकांचा कंटाळा येणार नाही.
  1. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून
  • अनेकदा तुमच्या मनात काहीतरी वेगळे असते पण प्रत्यक्षात त्यापेक्षा वेगळे वागण्याची कारणे अनेक असतात. जसे की, तुम्हाला राग आला कारण तुमच्या जोडीदाराने त्याची भांडी धुतली नाहीत. जेव्हा की तुम्ही नुकतेच किचन स्वच्छ करून आला असाल. प्रत्यक्षात तुमच्या रागावण्यामागचे खरे कारण असे असते की, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला होणार त्रास आणि तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले.

 मानसशास्त्रज्ञ डॉक्टर प्रियांका सांगतात की, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलायला हवे आणि तुमच्या रागामागचे जे खरे कारण आहे ते सांगायला हवे.

जेव्हा तुम्हाला वाटेल की, तुमच्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण होऊ शकेल अशावेळी खोलीतून बाहेर जा. कुठले तरी दुसरे काम करायला घ्या, जेणेकरून भांडणाचा विषय तुमच्या डोक्यातून निघून जाईल. सतत सोबत राहिल्यामुळे असेही होऊ शकते की, तुम्हाला तुमच्या जोडोदारामधील थोडे जास्तीच दोष दिसू लागतील. पण तुम्हाला स्वत:वर लक्ष द्यायचे आहे. सकारात्मक रहायचे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले चांगले क्षण, चांगल्या गोष्टी आठवा. त्याच्यातील केवळ चांगल्याच गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या काही त्रासदायक सवयींकडे दुर्लक्ष करावे लागेल.

  1. क्वॉलिटी टाइम घालवा
  • ही वेळ केवळ अडचणींची आहे असे मुळीच नाही. तुम्ही दोघे मिळून या क्षणांना सोनेरी क्षण बनवू शकता. त्यासाठी आपल्या जोडीदारासोबत आवडीची पुस्तके वाचा. जुने चित्रपट पहा. आवडीचे गेम खेळा. चित्र काढा. सोबतच व्यायाम करून स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्या. पण या गोष्टीकडे लक्ष द्या की, एकमेकांच्या इतकेही जवळ येऊ नका की, कंटाळा येऊ लागेल. बाहेरच्या जगासोबचे संबंध तोडू नका. तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल म्हणून काय झाले, व्हर्च्युअल वर्ल्ड तर आहेच. त्याच्याद्वारे तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजाऱ्यांशी कायम संवाद साधा. सोशल मीडियावरही काही वेळ घालवता येऊ शकेल.

संपत्तीची वाटणी कायद्यापेक्षा संस्कार मोठे

* सुधा कसेरा

मोबाइलची रिंग वाजताच दीपा स्क्रीनवर आपल्या मोठया बहिणीचा फोटो पाहून समजून गेली की, नक्कीच काहीतरी महत्त्वाचे असणार, कारण ती कधीच निरर्थक गप्पा मारायला फोन करत नसे.

तिने सांगितले की, ‘‘तुला माहिती आहे का? बिहारमधील वडिलांची सर्व जमीन दोन्ही भावांनी मिळून, तुझी आणि माझी सही स्वत:च करुन कवडीमोल किंमतीने विकली. मला आपल्या एका हितचिंतकाने फोन करुन ही माहिती दिली.’’

हे ऐकून दीपा सुन्न झाली. वडिलांच्या चितेची आग थंड होण्याआधीच भावांनी हे असे पाऊल उचलले, जणू ते त्यांच्या मरणाचीच वाट पाहत होते. वडिलांनी ती जागा स्वत:हून विकली असती तर सर्वांना समान वाटा मिळाला असता, पण अचानक अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी दीपाला बऱ्याचदा सांगितले होते की, कुटुंबात फक्त तिलाच आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जमिनीच्या पैशांतून तिला खूप फायदा होईल. ही घटना अपवाद नसून प्रत्येक घराची कथा आहे.

वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. बहुतांश घरातील पुरुष वडिलोपार्जित व्यवसाय करायचे. त्यामुळेच बहिणींच्या लग्नात त्यांना हुंडा म्हणून वडिलोपार्जित संपत्तीतील काही भाग देत असत. लग्नानंतरही त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात ते सहभागी व्हायचे आणि शक्य तितकी त्यांना मदत करायचे. एखाद्या महिलेला तिच्या सासरच्यांनी सोडून दिले किंवा वैधव्य आले तरी भाऊ किंवा वडील तिला सर्वतोपरी मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य समजत असत.

ते आईवडिलांबाबत असलेली आपली जबाबदारीही पार पाडत असत. दुसरीकडे लग्नानंतर मुलगी पूर्णपणे सासरची होऊन जात असे. पण, कालौघात जग आणि लोकांच्या विचारसरणीतही प्रचंड बदल झाला. आता वडिलोपार्जित व्यवसाय सोडून तरुण इतर शहरांमध्ये काम करण्यासाठी जाऊ लागले आहेत. एकत्र कुटुंब पद्धती ही त्रिकोणी कुटुंबात परिवर्तीत झाली असून प्रत्येक कुटुंब स्वतंत्रपणे राहू लागले आहे. यामुळे त्यांचा वैयक्तिक खर्चही खूप वाढला आहे.

महिला स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला आहे. मुली या भावांच्या खांद्याला खांदा लावून आईवडिलांची जबाबदारी घ्यायाला पुढे सरसावतात. आता हुंडयाची प्रथा कायदेशीररित्या अमान्य आहे. स्वावलंबी असल्याने मुलीही वडिलांकडून हुंडा घेण्यास विरोध करतात. हे सर्व पाहता वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांनाही हक्क मिळणे आवश्यक झाले आहे.

समान हक्क

१९५६ चा कायदा ‘हिंदू वारसा हक्क सुधारणा दुरुस्ती’ अस्तित्त्वात आल्यानंतर विवाहित महिलांना माहेरच्या वडिलोपार्जित मालमत्तेत पुरुषांच्या बरोबरीनेच समान हक्क बहाल केला. परंतु तो प्रभावी ठरला नाही. ९ सप्टेंबर २००५ पासून, हिंदू उत्तराधिकार अधिनियमाअंतर्गत नवीन नियमांनुसार, महिला आणि पुरुष दोघांचाही वडिलोपार्जित मालमत्तेवर समान हक्क आहे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, कायदा अस्तित्वात आला, पण प्रत्यक्ष व्यवहारातही तो कुटुंबीयांनी आचरणात आणला आहे का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. एखाद्या बहीण किंवा मुलीने स्वत:हून वडिलांच्या मालमत्तेच्या वाटणीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तर पुरुषांना ते आवडत नाही. ते तिचे हक्क अमान्य करतात. तिने नेहमीच त्यांच्यासमोर हात पसरावे असे त्यांना वाटत असते आणि अशावेळी तिची मदत करुन त्यांना समाजात कौतुकास पात्र ठरायचे असते.

ते बहिणीला मालमत्तेतील समान वाटेकरी मानण्याऐवजी केवळ आपल्या दयेस पात्र मानून स्वत:चे मोठेपण सुरक्षित ठेवण्यातच धन्यता मानतात. जणू ती त्या घरात जन्मलेलीच नसते. लग्न होताच माहेरच्या घरावरील तिचे सर्व अधिकारही संपुष्टात येतात आणि माहेरचे तिला स्वत:ला परके समजण्यास भाग पाडतात. ही एकप्रकारे तिच्या हक्काची विडंबना आहे.

विस्कटणारी नाती

‘स्त्री-पुरुषांत वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप’ या कायाद्यामुळे कुटुंबातील नात्यात बरीच कटुता आली आहे. यात दुमत नाही की जे काम पुरुष पूर्वी आपली नैतिक जबाबदारी समजून करीत होते तेच आता कायद्याच्या भीतीपोटीही करायला तयार नाहीत. पुरुषप्रधान देशातील पुरुषांच्या शतकानुशतके चालत आलेल्या मानसिकतेत कासवाच्या चालीने बदल होत आहे.

आताही पुरुष आपल्या आईवडिलांसाठी आर्थिक किंवा शारीरिक रुपात काहीही करीत नसतील तरीही वडिलोपार्जित मालमत्तेवर ते त्यांचा संपूर्ण हक्क समजतात. तर, आयुष्यभर, मुलीने जबाबदारीने त्यांच्यासाठी खूप काही केले असली तरी तिने संपत्तीत वाटा मागताच किंवा आईवडिलांनी तिला तो स्वत:हून देण्याची तयारी दाखवताच भाऊ तिचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. आपल्या हक्कांसाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावणे ही खूपच दूरची गोष्ट आहे, असे अनेकींच्या तोंडातून दररोज ऐकायला मिळते.

बहिणींना वाटा मिळणे हा अपवाद आहे. अनेकदा भाऊ भावालाच वाटा द्यायला तयार नसतो. संधी मिळताच मालमत्ता नावावर करायला मागेपुढे पाहत नाही. यामुळे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबतचा संबंध तुटला तरी त्यांना फरक पडत नाही.

मानसिकतेत बदल

बहिणींची वर्षानुवर्षे चालत आलेली मानसिकताही याला कारणीभूत आहे. लग्नानंतर अनेक बहिणी सासरच्या सणसभारंभांमध्ये प्रथापरंपरेनुसार भावांकडून मोठी रक्कम उकळू इच्छितात आणि संपत्तीतही वाटा मागतात. प्रत्यक्षात भावांपेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की, कायदा बनवण्यापेक्षा हे जास्त गरजेचे आहे की, आईवडिलांनी जिवंतपणीच मृत्युपत्र करुन त्यांच्या मालमत्तेची वाटणी करावी, जेणेकरुन त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणताही सदस्य त्यांच्या मालमत्तेवर अवैध कब्जा करू शकणार नाही.

कालौघात पुरुष आणि स्त्रीच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा. पैशांपेक्षा नातेसंबंधांना अधिक महत्त्व  देऊन नैतिकतेच्या आधारावर वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी व्हायाला हवी. आणि यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलांमध्ये एकमेकांसाठी निर्माण केलेली प्रेमाची भावना आणि पैशांपेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देणारे केलेले संस्कारच जास्तीत जास्त कुटुंब विभक्त होण्यापासून रोखण्यासाठी आणि समस्येचे निरसन करण्यासाठी सक्षम आहेत.

शिष्टाचार कोणासाठी?

– रीता गुप्ता

‘‘आई, मला माझ्या मैत्रिणीच्या निशाच्या घरी जायचे आहे. आज तिने वर्गात खूप छान नोट्स बनवल्या आहेत. उद्या परीक्षा आहे. मी एकदा तिच्या घरी जाऊन वाचून येते. जवळच रहाते ती. स्कूटीने जाऊन लगेच येते,’’ शशीने सुधा म्हणजे तिच्या आईला सांगितलं.

‘‘ही वेळ आहे का मुलींनी घराबाहेर पडण्याची? मी पहातेय सुधा की तू जरा जास्तच सूट देऊन ठेवली आहेस हिला काही बरंवाईट घडले ना, मग पश्चात्ताप करण्याची वेळ येईल आयुष्यभर,’’ आईने काही बोलायच्या आतच शशीची आजी म्हणाली.

‘‘वर्गातच नोट्स घ्यायचे होते ना तू. रात्र व्हायची वाटच कशाला पाहायची?’’ बाबा घरात शिरताच म्हणाले.

‘‘बेटा, तिच्या नोट्स सोड, तू स्वत: नोट्स बनव. आता रात्री ९ वाजता तुझे असे घराबाहेर पडणे योग्य नाही,’’ आईनेही समजावले.

साधारण तासाभराने शशीचा भाऊ त्याच्या खोलीतून बाहेर आला व आईला म्हणाला, ‘‘आई संध्याकाळपासून कुठे बाहेर गेलो नाहीए मी, एक चक्कर मारून येतो आणि मग बाईक घेऊन निघून गेला. कुठुनही कसला आवाज आला नाही. कोणीच काही विचारले नाही व म्हटलेही नाही.’’

दुटप्पी मानसिकता

प्रत्येक भारतीय घरात जवळपास हीच स्थिती असते. मुलीला तर सातत्याने शिकवण दिली जाते. कधी परक्या घरी जायचे आहे म्हणून, तर कधी जग चांगलं राहिलं नाही म्हणून. असं बोलू नकोस, असं चालू नकोस इ.ची लांबलचक यादी असते. मुलींना शिकवण्यासाठी कधी सरळसरळ तर कधी आडून आडून मुलींना सांगितले जाते की रस्त्यात गुंड मवाल्यांकडे कसे लक्ष द्यायचे नाही. वाटेत कोणी छेडछाड केली तर प्रतिउत्तर न देता निमूटपणे घरी कसे यायचे. जर काही गंभीर घडलेच तर चूका शोधून मुलींनाच दोषी ठरवले जातं की, तिने कपडेच असे घातले होते किंवा मग चांगल्या घरच्या मुली रात्रीचं फिरतात का? वर्तमानपत्रात येणाऱ्या बलात्कारांच्या बातम्या ऐकवून त्यांना अजूनच घाबरवले जाते.

असे नाही वाटू शकत का की त्रास खरं तर मुलांमुळेच आहे? तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की काही मुलींनी मिळून एका मुलाला छेडले, बलात्कार केला किंवा असेच काही अजून? नाही ना? रस्त्यांवर वेगाने दुचाकी चालवणारे काही अपवाद वगळले तर अपघातग्रस्त किंवा मृत्यू पावणाऱ्यांमध्येही अधिकीने मुलेच असतात. जेव्हा की मुलीही आता दुचाकी चालवतात.

लहानपणापासूनच शिकवावे

मुली लहानपणापासूनच खूप समजूतदार आणि भावनाप्रधान असतात. आता थोडे ज्ञान मुलांनाही दिले गेले पाहिजे. मुलांना लहानपणापासूनच सांगितले जाते, ‘अरे रडतो कशाला, ‘तू मुलगी आहेस का?’ ‘भित्रा कुठला, मुलगी आहेस का तू?’, ‘बांगड्या भरल्या आहेत का हातात?’, ‘अरे, तू किचनमध्ये काय करत आहेस?’ वगैरे. असे बोलून बोलून त्यांना आधीपासूनच संवेदनाहीन बनवले जाते.

दोष कुणाचा

घरात मुलींना नालायक मुलांपासून स्वत:चा बचाव करणे शिकवण्याबरोबरच मुलांना चांगली वर्तणूक करायला शिकवावे. मुले तर मुलेच असतात. मातीच्या गोळ्यासारखी. आपल्याला हवे तसे आपण त्यांना घडवू शकतो. आपल्याला हवे ते संस्कार, विचार त्यांना देऊ शकतो. मग तो मुलगा असो की मुलगी.

जेव्हा आपण एखाद्या रोडरोमियोला किंवा एखाद्या बलात्कारी माणसाला किंवा एखाद्या हिटलरशाही पतीला पाहतो तेव्हा मनमानी, मुजोरी करणे हा आपला हक्कच असल्याचे त्यांच्या वर्तमानातून जाणवते. अशावेळी लक्षात घेतले पाहिजे की हा दोष त्यांच्या संगोपनाचाही आहे. काही अनर्थ घडायला नको म्हणून सुधाने तर तिच्या मुलीला बाहेर जाऊ दिले नाही. पण असेही होऊ शकते की साधाभोळा दिसणारा गुणी मुलगा बाहेर काही अनर्थ घडवून आलेला असेल.

एकत्र कुटुंबातील प्रेम कसे कायम ठेवावे

* गरिमा पंकज

लंच टाईममध्ये पुनीताच्या जेवणाचा डबा उघडताच ऑफिसमध्ये सर्व खूष व्हायचे. तिचा डबा सर्व महिलांच्या आकर्षणाचे केंद्र असायचा, कारण त्यात नेहमीच विविध प्रकारचे चवदार पदार्थ असायचे. सर्वांना आश्चर्य वाटायचे की ती सकाळीच इतके सर्व कसे काय बनवते.

मग एके दिवशी पुनीताने यामागचे कारण सांगितले आणि म्हणाली, ती हे सर्व बनवत नाही, तर तिची बहीण बनवते. हे ऐकून महिलांमध्ये कुजबूज सुरू झाली. विभाने थेट प्रश्नच विचारला, ‘‘बहीण तुझ्याबरोबर सासरी राहाते का?’’

पुनीताने हसत उत्तर दिले की, ‘‘ती माझी सख्खी बहीण नाही, लहान जाऊ आहे, पण माझ्यासाठी बहिणीपेक्षाही खूप काही आहे. तिच रोज माझ्यासाठी आणि मुलांसाठी टिफिन बनवते.’’

हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. ‘‘तिच्याकडे एवढा वेळ असतो? ती नोकरीला जात नाही का?’’

‘‘हो, ती नोकरीला जात नाही, पण सर्व घर सांभाळते. आमच्या सर्वांची लाडकी आहे. ती नसती तर मी इतक्या सहजी नोकरी करू शकले नसते.’’

‘‘छान, ही फारच चांगली गोष्ट आहे. आजच्या जगात कोण दुसऱ्यासाठी एवढे करते?’’ विभा म्हणाली.

‘‘दुसऱ्याचे आणि आपले असे काही नसते. ज्याला आपले मानतो तिच व्यक्ती आपल्यासाठी सर्व काही असते. एक बहीण माहेरी असेल तर एक सासरीही असू शकते,’’ असे म्हणत पुनीता हसली.

पुनीता एकत्र कुटुंबात राहात होती आणि लहान जावशी तिचे चांगले संबंध होते. पुनीताच्या पतिचे निधन झाले होते, पण या कुटुंबाने तिला कधीच ती एकटी पडल्याचे जाणवू दिले नाही. संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभे राहिले.

आज बहुसंख्य विभक्त कुटुंबं पाहायला मिळतात, पण जर तुम्ही एकदा एकत्र कुटुंबात राहाल तर कधीच वेगळे राहण्याचा हट्ट करणार नाही. परिस्थितीमुळे आज वेगळे राहिले जाते. महानगरांमध्ये कुटुंबाचा अर्थ पती-पत्नी आणि मुले असाच होऊन गेला आहे.

एकत्र कुटुंब विरुद्ध एकटे कुटुंब

अलीकडेच, चित्रपट दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या एका ट्विटने एकत्र कुटुंब विरुद्ध एकटे कुटुंब यातील वादाला तोंड फोडले, जेव्हा त्यांनी सोशल मिडियावर लिहिले, ‘‘आपण आपल्या जीवन पद्धती म्हणजेच एकत्र कुटुंबात परत यायला हवे. सर्व प्रकारची मानसिक असुरक्षितता, एकटेपणा आणि औदासिन्य टाळण्यासाठी कदाचित हा एकमेव मार्ग असेल. कुटुंब नावाची छत्री आपल्या मनाला सुरक्षिततेची भावना देते.’’

यावर मीटू कार्यकर्त्या आणि पत्रकार रितुपर्णा चॅटर्जी यांनी लिहिले, ‘‘हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी अतिशय जवळून एक एकत्र कुटुंब पाहिले आहे, जिथे महिलांच्या श्रमांचे शोषण केले जाते. महिला एकमेकींविरोधात उभ्या ठाकतात.’’

अर्थात, कोणत्याही गोष्टीला चांगली आणि वाईट दोन्ही बाजू असतात. आपल्याला जर संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा आणि प्रेम हवे असेल तर आपण काही तडजोडी करायला तयार असले पाहिजे. पण एकंदर विचार केल्यास, अशा एकत्र कुटुंबांत राहण्याचे फायदे नुकसानापेक्षा अधिक असतात. जेव्हा घरात बरेच लोक असतात, तेव्हा खटके उडणे आणि स्वत:ला चांगले सिद्ध करण्यासाठी स्पर्धा लागणे, हे स्वाभाविक आहे. पण या बदल्यात मनाला जो आनंद मिळतो, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. कुटुंबातील महिलांची स्थिती कशी असेल आणि त्यांचे शोषण होईल की नाही हे मोठया प्रमाणावर महिलांची आर्थिक स्थिती आणि घरातील इतर महिलांच्या वृत्तीवर अवलंबून असते.

एकत्र कुटुंबात राहाण्याचे तसे तर बरेच फायदे आहेत, पण आम्ही तुम्हाला काही खास फायदे सांगतो :

वस्तू शेअर करण्याची सवय : एकत्र कुटुंबात राहणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. येथे तुम्ही वस्तू शेअर करायला शिकता. आपल्या वस्तू इतरांशी शेअर करून आनंद घेण्याची मजा तुम्ही लहानपणापासूनच शिकता. तुम्हाला याचा फायदाही होतो. एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल पण घरातील इतर सदस्याकडे असेल तर ती तुम्हाला सहज मिळते. कधी आयुष्यात असाही प्रसंग येतो, जेव्हा मोठे आर्थिक संकट येते, पण एकत्र कुटुंबाच्या आधारावर तुम्ही त्यातून सहज बाहेर पडू  शकता.

नुकसान कमी होते : एका संशोधनानुसार वेगळे राहणाऱ्यांच्या सामग्रीचे ५० टक्क्यांपर्यंत जास्त नुकसान होते. एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वात मोठा फायदा असा की तुम्ही कुठल्याच गोष्टी वाया घालवत नाही. जे एकटे राहातात ते वीज, गॅस, पाणी आदी जास्त खर्च करतात. घरात खूप माणसे असतील तर खर्चही विभागला जातो.

कमी तणाव : एकटे राहणाऱ्याला जीवनात जास्त तणावाचा सामना करावा लागतो, पण एकत्र कुटुंबात लोक अधिक सुखी राहतात. एकत्र राहण्याचा हादेखील फायदा आहे की तुम्ही अधिक सुदृढ आणि आनंदी राहता कारण तुम्ही तुमचे सुख-दु:ख इतरांशी वाटून घेऊ शकता.

संरक्षक भिंत : एकत्र कुटुंबात जर पती बाहेरख्याली असेल किंवा पत्नीला मारझोड करत असेल तर अशावेळी कुटुंबातील इतर सदस्य त्याला समजावतात. अशा परिस्थितीत एकत्र कुटुंब महिलांसाठी संरक्षक भिंतीसारखेच काम करते.

पालनपोषणासाठी उपयुक्त : मुलांच्या पालनपोषणासाठी एकत्र कुटुंबातील वातावरण चांगले समजले जाते. मुले आजी-आजोबा, आत्या, काका यांच्या सहवासात कधी मोठी होतात हे कळतदेखील नाही. मुलांच्या मानसिक विकासासाठीही एकत्र कुटुंब उत्तम ठरते.

एकत्र कुटुंबात कसे जुळवून घ्याल

कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी कायम राहावी यासाठी सर्वात गरजेचे आहे की आपल्या मुलांना मोठयांचा आदर करायला शिकवा. हे केवळ मुलांसाठीच लागू होत नाही तर घरातील सर्वच सदस्यांनी मोठयांचा आदर करायला हवा, जेणेकरून कुटुंबरुपी मणी एका माळेत व्यवस्थित गुंफून राहातील.

मुलांसमोर कधीच कोणाला ओरडून बोलू नका. जसे घरातील वातावरण असेल त्याचप्रमाणे मुले शिकतात. मुलांना नेहमीच मोठयांसमोर विनम्र आणि लहान मुलांशी संवेदनशीलपणे वागायला शिकवा. स्वत:ही तसेच वागा.

विभक्त कुटुंबात मुलांचे गरजेपेक्षा जास्त लाड होतात. यामुळे ती हट्टी होऊ शकतात. शक्य तेवढे आपल्या मुलांना पाय जमिनीवरच ठेवून चालायला शिकवा.

असा वाढवा मुलांचा आत्मविश्वास

* ऋचा शुक्ला, सीसेम, वर्कशॉप इंडिया

राहुलने वर्तुळातून चेंडू काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. आणि मग हताश होऊन रडू लागला. त्याला रडताना पाहून त्याची आई तिथे आली आणि त्याला उचलून मिठी मारली. मग तिने सांगितले की सातत्याने प्रयत्न करत राहा म्हणजे नक्कीच यशस्वी होशील. तिने राहुलला त्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा तो आपले नावही लिहू शकत नव्हता. सातत्यापूर्ण प्रयत्नांनी तो पुढे आपले नाव लिहू लागला.

अशाप्रकारच्या प्रोत्साहन आणि सकारात्मकतेमुळे मुलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होते. मुलांच्या स्वत: आणि प्रतिच्या धारणा कमी वयातच विकसित होतात. एक मूल कसा विचार करते? काय पाहते? काय ऐकत असते? आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया देते? इत्यादी बाबी त्याच्या संपूर्ण प्रतिमेची निर्मिती करतात. जर एखाद्या मुलामध्ये चिंता, ताण, असंतोष आणि भयाची भावना निर्माण झाली तर तो चिडचिड करू लागतो. त्याचा आत्मविश्वास ढळू लागतो.

अनेक संशोधनातून कळंय की लहान वयातच अनेक मुले ताण-तणावाचे बळी बनतात. बालपणीच्या नकारात्मक अनुभवांमुळे त्यांच्या शरीरावर आयुष्यभरासाठी नकारात्मक प्रभाव पडल्याचे दिसून येते.

मुल तणावग्रस्त राहण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यात एखादे कठीण कार्य करताना, काही विरूद्ध परिस्थिती निर्माण होते. मूल जेव्हा आपल्या शाळा आणि ट्यूशनचा अभ्यास समजण्यात किंवा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरते, तेव्हादेखील त्याच्यात तणाव निर्माण होतो. तो प्रदर्शित करण्यास आणि अभ्यास करण्यात ते स्वत:ला अपयशी समजू लागतो, कारण त्याच्या मित्रांसाठी असे करणे सोपे असते. यामुळे आत्मविश्वास ढळू लागतो.

मुलाने गमावलेला आत्मविश्वास हे त्याच्या संकोचावरून वा गप्प असण्यावरून समजू शकते. अशावेळी आई-वडिलांनी हे संकेत ओळखणे गरजेचे असते. अशा काही पद्धतींचा अवलंब करावा, जेणेकरून मुलांना आपल्या समस्यांना तोंड देण्यात सहाय्य मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आईवडिलांची भूमिका ही घरातील वातावरण मैत्रीपूर्ण करण्याच्या दृष्टीने असावी. मुलांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यांना कोणीही न ओरडू नये. त्यांचे म्हणणे त्यांना निर्धास्त सांगण्याची संधी मिळाली पाहिजे.

संवाद ठेवा : मुलांमध्ये सामाजिक कौशल्य विकास हे त्यांच्या कुटुंबासोबत जोडले गेल्याने तसेच संवाद साधल्याने होतो. त्यामुळे मुलांसोबत प्रभावी संवाद साधा. सहयोगी, सुखदायी आणि स्नेहशील बना. यामुळे संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत होईल. मग, मुलांमध्ये मोकळेपणाने आत्मविश्वास वाढेल.

आपली आवड निवडण्याची संधी : आपली आवड निवडणे, पर्याय आणि मतं मांडण्यात त्यांना मदत करण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका असते. पण त्यांना त्यांच्या आवडीची निवड करण्याची संधी द्या. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ही सर्वात योग्य पद्धत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात, स्वत:ची निवड समजण्यात ते सक्षम होतात, ज्यामुळे त्यांना आनंद मिळू शकतो.

प्रशंसा आणि पुरस्कार : आपल्या मुलांना सांगा की आपले त्यांच्यावर किती प्रेम आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती विशेष आहे. प्रत्येकाची स्वत:ची क्षमता आणि प्रतिभा असते. हे आईवडिलांनी मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. मुलांसाठी सकारात्मक आठवणींची निर्मिती करा. छोट्या-छोट्या संकेतांच्या माध्यमातून त्यांच्या यशाचे कौतुक करा. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टिकर, कुकीज अशा छोट्या वस्तूंनी त्यांना पुरस्कृत करा. तुमच्या अपेक्षांवर खरे न उतरल्यास त्यांना ओरडू नका. पुढच्या वेळेस त्यांना चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करा.

तुलना कधीच करू नका : आपल्या मुलांच्या क्षमतांची तुलना दुसऱ्यांच्या मुलांशी करू नका. सर्व मुलांच्या मनात वेगवेगळे भाव असतात. त्यांच्या मित्रांशी त्यांची तुलना केल्याने त्याच्या मनात हीनभावना निर्माण होते. तुलना केल्याने प्रतिस्पर्धी असल्याची भावना मुलाच्या मनात निर्माण होते, ज्यामुळे मुलांच्या मनात ईर्षा होते आणि मुलांसाठी हानिकारक ठरू शकते.

कामात दृढ असणे : मूल जेव्हा त्याला दिले गेलेले काम पूर्ण करतं तेव्हा त्याला स्वत:मध्ये आत्मविश्वास जाणवतो. त्याला प्रोत्साहन मिळते. उदाहरणार्थ जेव्हा विवेक आपल्या बूटाची लेस बांधण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता, पण तरीही त्याला जमत नव्हते. तेव्हा तो निराश झाला. यावेळी त्याच्या आईवडिलांनी त्याला हार न मानता प्रयत्न चालू ठेवण्यास यशस्वी होशील असे सांगितले आणि तो खरंच यशस्वी झाला. त्यांना अशाप्रकारे समजवण्याची गरज असते, जेणेकरून त्यांना ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.

शिक्षकांशी बातचीत करा : आईवडिलांनी मुलाची शिक्षक आणि मित्रांप्रति असलेली वागणूक समजूण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मुलाचं सामाजिक जीवन समजण्यास मदत मिळते. बाहेरच्या जगात त्याचे वागणे समजून घेणे गरजेचे आहे. जर तो घरी एखादी गोष्ट करू शकत नसेल, तर तो शाळेत करण्यास सक्षम आहे का?

यामुळे त्यांच्या आईवडिलांना हे समजेल की मुलांना शिकण्यात काही समस्या येत आहेत का? किंवा त्यांच्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे का? मुलांच्या मित्रांशी तसेच शिक्षकांशी बोला, जेणेकरून त्याची रूची जाणून घेता येईल.

काल्पनिक खेळ खेळा : काल्पनिक खेळांच्या माध्यमातून मुले त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या आणि वस्तूंच्या मदतीने काल्पनिक परिस्थिती तयार करतात आणि त्यात आपली भूमिका बजावतात. अशा खेळात त्यांना खूप विचार करता येतो. ते ज्या प्रकारचे जीवन असण्याची इच्छा बाळगतात त्याविषयी माहिती मिळते. या खेळांत सामील झाल्यामुळे आईवडिलांना त्यांच्या काल्पनिक जगात डोकावण्याची आणि त्यांना आत्मविश्वासाने प्रोत्साहित करण्याची संधी मिळते.

मुलासह विश्वासाचे आणि मित्रत्त्वाचे संबंध विकसित करा, जेणेकरून जेव्हा त्याला समस्या असेल तेव्हा तो तुमच्याजवळ येईल. तुमचं ऐकेल आणि तुमच्या सल्ल्याचा सन्मान त्याला आपलं मत विकसित करण्यात मदत करा. त्याच्या आत्मविश्वास आणि समजूतदार होण्याची सीमा वाढेल. यामुळे त्याला आपल्या मित्रांसमोर आपले म्हणणे मांडण्यात त्यांचे म्हणणे ऐकण्यात आणि दुसऱ्यांच्या मनांचा मान ठेवण्यात मदत मिळेल. यासाठी वेगवेगळ्या लोकांमध्ये आपली ओळख आणि स्वतंत्र अस्तित्त्व राखण्याच्या दृष्टिने हे महत्त्वाचे ठरेल.

एकटी आई आणि मुलं

– चारुलता सूर्यवंशी

मुलांचं संगोपन आईवडील दोघांनाही करावं लागतं. पण काही कारणामुळे मुलांना जर वडिलांना मुकावं लागलं, तर मुलांचं संगोपन केवळ आईलाच करावं लागतं.

हेच एकलपालकत्व (सिंगल पॅरेंटिंग) होय

पालक व बालक या दोघांसाठीही हे जीवनातील एक आव्हान ठरतं. यात बाईला आई व बाबा या दोन्ही भूमिका पार पाडणं भाग पडतं. साहजिकच यामुळे अनेक विपरीत घटनांना तिला सामोरं जावं लागतं व यामुळे संताप, भय, एकटेपणा व असहाय्यता या भावना तिला सतत जाणवू लागतात. पण यातून मार्गही अखेर तिलाच काढायचा असतो. यासाठी तिने काही खास बाबी ध्यानात ठेवल्या तर या अडचणींवर तिला सहजतेने मात करता येऊ शकेल.

मनातील संताप आवरा

मुलाला आईहून अधिक वडिलांची गरज असते असं मानलं जातं. आईवडील दोघांचंही प्रेम मिळणारी मुलं जीवनात अधिक सफल होतात. पण काही कारणामुळे जर ही जबाबदारी केवळ एकट्या आपल्यावरच येऊन पडली तर घाबरू नका. उलट या जबाबदारीला एक आव्हान समजून सामोरं जा.

जीवनातील आव्हानं पेलताना आपला विकास होत असतो. आपण ती चांगली पेलू शकलात तर आज टीका करणारे लोक उद्या तुमचं कौतुकही करू लागतील.

अनेकदा एकल पालकत्व निभावणाऱ्या आयांना आपल्या मुलांना वडिलांची माया मिळू शकत नाही यासाठी अकारण हळहळ वाटते. पण असे विचार मनात आणणंही चुकीचं आहे; कारण अशाने तुमचं जगणंही कठीण होईल.

अशा तणावातून बाहेर यायचं तर आधी आपण कणखर बना, मुलांनाही तसं बनवा. आपणासारख्या इतरही अनेक महिला या जगात अशा घटनांचा सामना करत असतील याचा विचार केलात की मग आपण एकाकी नाही या सुखद जाणिवेने आपणास मोठा दिलासा मिळेल.

योग्य मार्गदर्शन

योग्य मार्गदर्शन, प्रेम, सहकार्य व वेळ या गोष्टी असतील तर एकटी आईदेखील मुलांचं पालनपोषण सहजतेने करू शकेल.

याबाबत पत्रकार मानसी काणे सांगते, ‘‘लग्नानंतर दीड वर्षांतच एका अपघातात माझे पती वारले. पण आधी आम्हाला एक मुलगा झालेला होता. आज या घटनेला १० वर्षं उलटून गेली आहेत. मुलासोबत गेली १० वर्षं मी एकटीच राहातेय. त्याला घडलेलं सारं ठाऊक आहे. पण तो अगदी सहजतेने समाजात वावरतोय. अशा जीवनातील अडचणी त्याला ठाऊक आहेत व त्यावरील उपायही तो जाणतो.

‘‘पतीच्या निधनानंतर मी नोकरीला लागले. पत्रकारितेतील नोकरीची माझी दिनचर्या त्यालाही आता माहिती झालेली आहे व यामुळे आम्ही मजेत जगतोय.’’

उचित निर्णय

मानसी पुढे सांगते, ‘‘एखादी बाई पतीला गमावल्याने एकटी पडते तेव्हा तिला अनेकदा दुसरा विवाह कर असा सल्ला दिला जातो आणि बहुतेकदा ती याला नकार देते. याचं कारण आजची स्त्री जीवनातील संकटांचा सामना करायला सक्षम बनलेली आहे. तिच्यात कमालीचा आत्मविश्वास आलेला आहे. मलाही खूप जणांनी दुसरं लग्न कर असा सल्ला दिला होता.

पण ते करायचं नाही असं मी ठरवलेलं होतं. आज १० वर्षांनंतरदेखील मला व माढ्या मुलालाही या निर्णयाचा अभिमान वाटतोय.’’

गरज भावनिक आधाराची

एकल पालकांच्या मुलांनादेखील काही सामाजिक संकटांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना कसा करावा याची शिकवण आईच मुलांना देऊ शकते.

एकल वडील व एकल आई यांच्या भूमिकांत अनेकदा आपल्याला फरक जाणवेल. मुलांचं संगोपन, घर, कुटुंब, नोकरी ही सर्वच कामं आईला करावी लागतात. या सर्व कामात ताळमेळ साधणं खूप अवघड असतं.

आधाराने जखमा भरतात

याबाबत स्वाती कटारे सांगतात, ‘‘मी ८ वर्षांची असताना माझे वडील पोलिसांचं कर्तव्य निभावताना मारले गेले. यामुळे आमच्या कुटुंबाचा आधारच हरपला. पण माझी आई डगमगली नाही. तिने अनेक सामाजिक संकटांचा धाडसाने सामना केला व आम्हालाही भावनिक तणावातून बाहेर काढलं.

‘‘आज मागे वळून पाहताना मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. कारण कुटुंबाच्या वाईट काळात व विपरीत परिस्थितीत ती एक शक्ती बनून आमच्यामागे उभी राहिली होती.’’

अभिमानाची बाब

आज अनेक महिला विवाहित नसूनही मुलांना सांभाळत आहेत. एकल आई बनणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब ठरलीए. मिस यूनिवर्स सुष्मिता सेनने याबाबतीत एक आदर्श घालून दिलाय. आपलं धकाधकीचं जीवनमान सांभाळून तिने एक यशस्वी पालक असा लौकिक मिळवलाय.

सुष्मिता सेन सांगते, ‘‘मला मुलांची भारी आवड असल्याने मी आधी एका मुलीला दत्तक घेतलं. काही वर्षांनी तिला कोणीतरी जोडीदार हवी म्हणून आणखी एक मुलगी मी दत्तक घेतली. माझ्या दोन्ही मुली आता एखादा सामाजिक कार्यक्रम असो वा फॅशन पार्टी हरेक समारंभात सतत माझ्यासोबत असतात.’’

धाडसी पाऊल

टीव्हीवरील कलाकार उर्वशी ढोलकिया उर्फ कोमोलिका व नीना गुप्ता यादेखील एकल माताच आहेत. उर्वशीने एका रिअॅलिटी शोमध्ये या करुण कथेचा खुलासाही केला होता. नीना गुप्तानेदेखील आपली मुलगी मसाबाला धाडसाने स्वीकारून तिला समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं.

एकल आई वा एकल वडील होणं आजकाल खूपच कठीण आहे, पण अखंड सावधानता व धाडस बाळगल्याने जीवनाला एक नवी दिशा मिळू शकते. पण आशा व विश्वास सोडला तर तुमच्याबरोबरच मुलाची प्रगतीही खुंटेल. यासाठी निर्भयतेने एकल पालकाची भूमिका चोख पार पाडून इतरांसाठी एक आदर्श बना!

माझी आई माझी ताकद

* पारुल भटनागर

‘‘सकाळी ५ वाजताचा अलार्म वाजत नाही तोच आई लगेचच उठून उभी राहते. कामाला लागते. त्यानंतर जेव्हा ती आम्हाला उठवू लागते तेव्हा आम्ही मात्र फक्त पाच मिनिटे आणखी झोपू दे, असे सांगून लोळत राहतो. उठल्याबरोबर आम्हाला ब्रेकफास्ट, लंच सर्व तयार मिळते. स्वत:ची तयारी करतानाही आम्ही कधी तिला चप्पल आणून दे असे सांगते, तर कधी आई प्लीज माझाया ड्रेसला इस्त्री करुन दे, असे म्हणत तिचीच मदत घेते.

‘‘आम्हीच नाही तर वडील आणि घरातील इतर सदस्ययही तिच्याकडे अशाच प्रकारे सतत काही ना काही मागत असतात. तिला कामाला लावतात. आई मात्र चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम ठेवून आमच्या प्रत्येकाचे काम आनंदाने करते. तिला स्वत:लाही ऑफिसला जायचे असते. पण स्वत:सोबत कुटुंबाच्या सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या, हे तिला चांगल्या प्रकारे माहीत असते.

‘‘घरातल्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या ऑफिसला जायचे असते. कधीकधी तर मला आश्चर्य वाटते की, इतक्या चांगल्या प्रकारे ती सर्व कसे काय मॅनेज करते? मलाही तिच्याकडून हे सर्व शिकून तिच्यासारखीच बनायचे आहे. खरेच माझी आई एक परिपूर्ण स्त्री तर आहेच, सोबतच माझी ताकद आहे. प्रत्येक घाव सहन करुन लोखंडासारखे मजबूत बनून जीवन जगण्याची योग्य पद्धत तिच्याकडूनच मी शिकत आहे,’’ असे १७ वर्षीय रियाने सांगितले.

फिटनेससाठी नो कॉम्प्रमाईज

ऑफिसला लवकर जाण्याच्या घाईत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आजारांच्या रुपात अनेक अडचणींचा सामाना करावा लागेल. म्हणूनच सकाळचा फेरफटका मारण्याच्या दिनक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. त्यासाठी सकाळी अर्धा तास लवकर उठावे लागले तरी हरकत नाही, असे आईचे म्हणणे असते.

ती हे केवळ स्वत:च करत नाही, तर कुटुंबातील सर्व सदस्यांनाही करायला भाग पाडते. कारण तिला माहीत असते की, फिटनेस फक्त तिच्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच गरजेचा आहे. सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका मारल्यामुळे आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, सोबतच दिवसभर प्रसन्न वाटते. आपण उत्साहाने काम करू शकतो, हे ती  घरातील सर्वांना समजावून सांगते.

आई, ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणते की, कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तिचे स्वत:चे आरोग्यही निरोगी राखणे गरजेचे आहे.

नोकरदार महिला या गोष्टीकडे विशेष करुन लक्ष देतात. त्यांना माहीत असते की, वय वाढू लागल्यानंतर महिलांच्या शरीरात आयर्न, कॅल्शियमची कमतरता जाणवू लागल्याने त्या थकून जातात. आजारी पडू शकतात. म्हणूनच कुटुंबासह त्या स्वत:च्या डाएटकडेही विशेष लक्ष देतात.

कुठलेच काम टाळायचे नसते, हे शिकलो

असे म्हणतात की, आईकडे जादूची छडी असते, जिच्यामुळे ती प्रत्येक कठीण गोष्टही सहज सोपी करते.

कुणालने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, एकाच दिवशी आईची ऑफिसमध्ये मीटिंग होती आणि आमची पार्टी असल्यामुळे मला शाळेत भात तयार करुन न्यायचा होता. आमच्या मोलकरणीनेही नेमकी त्याच दिवशी दांडी मारली. वडिलांनी तर सकाळीच सांगितले होते की, आज त्यांना मटार-बटाटयाची भाजी खायची इच्छा आहे. इतकी सर्व कामे करायची होती. तरीही माझ्या आईने कोणालाच नाराज केले नाही.

घरातले कोणतेच काम अर्धवट ठेवले नाही. इतकेच नाही तर वेळेवर ऑफिसलाही गेली. ती संध्याकाळी घरी आल्यावर आम्हाला हे सर्व समजले. तेव्हा आम्हाला वाटले की, आम्हीही आपल्या लाडक्या आईसाठी काहीतरी करायला हवे. मग काय, मी आणि वडिलांनी तिच्यासाठी डिनर तयार करुन तिला सरप्राईज दिले. माझ्या आईने अशी कितीतरी कामे फक्त एकदाच नव्हे तर अनेकदा केली आहेत. तिला असे करताना पाहून मला प्रेरणा मिळते आणि मलाही तिच्याचसारखे बनायचे आहे.

स्वत:ला नेहमीच ठेवते टापटीप

आईला हे चांगल्या प्रकारे माहिती असते की, तिची मुलगी तिला स्वत:ची ताकद तर समजतेच, पण सोबतच आपला आदर्शही मानते. त्यामुळेच ती स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाकडे, नीटनेटके राहण्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही.

आपल्या आईबाबत कृती सांगते की, कुणीही साधा एक आवाज दिला तरी आई लगेचच धावत येते. तिचा संपूर्ण दिवस घर आणि ऑफिसच्या कामात निघून जातो. तरीही ती स्वत:ला नेहमीच टापटीप ठेवते. लेटेस्ट आऊटफिट वापरते. बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तरीही स्वत:च्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करते, जेणकरुन तिची त्वचा नेहमीच सुंदर आणि तजेलदार दिसेल.

ती आम्हालाही त्वचा नेहमीच तरुण आणि सुंदर रहावी यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देते. फक्त सल्लाच देत नाही तर जबरदस्तीने आम्हाला तसे करायला भाग पाडते, जेणेकरुन हळूहळू आम्हाला पाणी पिण्याची सवय लागेल. मी जेव्हा कधी माझ्या आईसोबत जाते तेव्हा मला सतत तिचा अभिमान वाटत असतो की, ती माझी आई आहे. प्रत्येक जण तिच्या व्यक्तिमत्त्वाचे भरभरुन कौतुक करत असतो.

कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीची घेते काळजी

आई कुटुंबाची ताकद आहे, असे उगाच म्हणत नाहीत, तिला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडीची, नावडती गोष्ट बरोबर माहिती असते. कधी, कोणाला काय हवे असते हे तिला न सांगताही समजते.

आदर्शने आपल्या परीक्षेच्या दिवसांची आठवण काढून सांगितले की, मागच्या आठवडयात माझी परीक्षा होती. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. आईला माहीत होते की, मी घाईगडबडीत सवयीप्रमाणे माझे हॉलतिकीट घेऊन जायला विसरणार. त्यामुळे तिने आधीच ते माझ्या बॅगेत ठेवले होते. परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर मला हॉलतिकीटची आठवण झाली आणि मी घाबरलो. पण माझी आई ग्रेट आहे, याची आठवण होताच मी बॅग तपासली आणि मला तिने ठेवलेले हॉलतिकीट सापडले.

इतकेच नाही तर जेव्हा माझ्या वडिलांना महत्त्वाची कागदपत्रे हवी असतात तेव्हा आईच ती शोधून देते. याचाच अर्थ आम्ही तिच्याशिवाय अपूर्ण आहोत.

मुलांना देते चांगल्या वर्तणुकीची शिकवण

मुलांसमोर वेळ घालवण्यासाठी भलेही आईकडे पुरेसा वेळ नसतो, पण तरीही ती आपल्या मुलांची वर्तणूक चांगली असावी, यासाठी सतत धडपडत असते.

मोठयांसमोर कशाप्रकारे वागायला हवे, घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा, कुणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर प्रेमाने त्याला त्याची चूक कशी समजावून सांगायची, आईवडील, मोठयांना उलट उत्तर का देऊ नये, नेहमी सर्वांच्या मदतीसाठी कसे पुढे रहावे, अशाप्रकारची सर्व शिकवण ती मुलांना देते.

आईपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ही गोष्ट कोण समजू शकेल की, मुलांसाठी त्यांची पहिली शाळा त्यांचे आईवडीलच असतात. त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत आणि दैनंदिन व्यवहारावर आईवडिलांचाच ठसा असतो. म्हणूनच घरातील कुठल्याही सदस्याने मुलांसमोर अर्वाच्च भाषेत बोलू नये, गैरर्वतन करु नये याकडे आई सतत लक्ष देत असते.

समजावते अभ्यासाचे महत्त्व

मुलाला क्लासला घातले म्हणून आई निश्चिंत होत नाही तर क्लाससोबतच ती स्वत:ही त्याच्या अभ्यासासाठी वेळ देते, जेणेकरुन तो कोणत्या विषयात तरबेज आहे आणि कोणत्या विषयात कच्चा आहे, हे तिच्या लक्षात येईल. मुलाला चांगले गुण मिळावे म्हणून ती त्याच्याकडून कच्च्या विषयाची एखाद्या शिक्षकाप्रमाणे चांगली तयारी करुन घेण्याचा प्रयत्न करते.

मुलाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया रचण्यासाठी आईची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका कोणीही नाकारू शकणार नाही. तिने मुलावर दरदिवशी घेतलेल्या या मेहनतीचे फळ मुलगा स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहिल्यावरच तिला मिळते.

कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे घालवते वेळ

कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे वेळ घालवण्याला ती नेहमीच प्राधान्य देते. कारण थोडासा जरी वेळ कुटुंबासोबत घालवता आला तरी तो वेळ दिवसातील सर्वोत्तम वेळ ठरेल आणि कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्याच्याकडे कुटुंबाचे दुर्लक्ष झाले असे वाटता कमा नये.

आई कुटुंबात धाग्याप्रमाणे असते, जिच्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य या धाग्यात मोती बनून प्रेमाने गुंफला जातो. त्यामुळे दिवसातील काही क्षण का होईना, पण कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित आनंदाने वेळ घालवावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असते.

कुठलेच कार्यक्रम टाळत नाही

आजकाल व्यस्त दिनक्रमामुळे नातेवाईकांना भेटण्याची संधी कमीच मिळते. येथे आईची जबाबदारी जास्तच वाढते कारण तिने जर वेळ नाही म्हणून असे कार्यक्रम टाळले तर मुलांना आपले नातेवाईक कोण, हे समजणारच नाही.

कौटुंबिक सोहळयात सहकुटुंब सहभागी होऊन कौटुंबिक नाते दृढ करण्याचा तिचा प्रयत्न असतो. याबाबत श्रेया सांगते की, मी थकली आहे किंवा माझी अजून खूप कामे शिल्लक आहेत असे सांगून माझ्या आईने कधीच आमच्या कुटुंबातील लग्नसोहळा किंवा इतर कार्यक्रम टाळले नाहीत. उलट ती प्रत्येक कार्यक्रमाला आपुलकीने जाते.

इतकेच नाही तर घरी येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाचा ती हसतमुखाने पाहुणचार करते. नाते, कुटुंबांचे महत्त्व समजून घ्या, कारण एकत्र कुटुंबात जी ताकद असते ती वेगळे राहण्यात नाही, असे ती आम्हाला नेहमीच समजावून सांगत असते.

वेळेचे नियोजन करायला शिकवते

वेळेचे योग्य प्रकारे नियोजन कशा प्रकारे करायचे हे तर आईकडूनच शिकायला हवे. आपला अनुभव सांगताना राज म्हणाला की, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. यामुळे माझे पालक माझ्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. माझे आईवडील दोघेही कामला जातात. तरीही माझी आई घरही अतिशय व्यवस्थितपणे सांभाळते.

मी एखादी चूक केल्यास ती केवळ नजरेच्या धाकाने मला त्या चुकीची जाणीव करुन देते. यामुळे मी ती चूक दुसऱ्यांदा करण्याची हिंमतच करू शकत नाही. वेळेचे नियोजन कसे करायचे, हे मी माझ्या आईकडूनच शिकलो. मी तर असे म्हणेन की आतापर्यंत मी जे काही यश मिळवले आहे ते केवळ माझ्या आईमुळेच शक्य झाले.

आई बनवते धीट

ज्याप्रमाणे आई परिस्थितीचा सामना धैर्याने करते त्याचप्रमाणे तो धैर्याने करण्यासाठीचा धीटपणा मुलांच्या अंगी बाणवते. अनुभवने सांगितले की, माझ्या आईचे मौजमजा करण्याचे दिवस होते तेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अशावेळी आईने स्वत:ला या द:खातून तर सावरलेच, पण आम्हालाही कधी वडिलांची कमतरता भासू दिली नाही. नोकरी करुन तिने आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या.

आम्ही धीट व्हावे यासाठी ती सतत प्रयत्न करत असते. वडिलांच्या जाण्याने ती मनाने हळवी झाली होती, पण आमच्यासमेर तिने कधीच तिच्या डोळयात अश्रू येऊ दिले नाहीत. तिचा संघर्ष आणि मेहनत पाहून माझ्या तोंडून निघणारे कौतुकाचे शब्द थांबूच शकत नाहीत. मी माझ्या आईला फक्त एवढेच सांगेन की, तुला जगातील प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करेन.

अतिप्रेम ठरेल डोकेदुखी

* निधी गोयल

पती-पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास आणि समर्पण या भावनांनी जोडलेले असते. जसजसा एकमेकांना वेळ दिला जातो तसे नाते अधिक घट्ट होत जाते. गोड नात्यात काही कारणास्तव आंबटपणा कालवल्यास त्याचे विष बनते. त्याचप्रमाणे अतिप्रेम दोघांसाठी हानिकारक ठरू शकते.

खरंतर, पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करतो तेव्हा तोदेखील तुमच्याकडून बेशुमार प्रेमाचे अपेक्षा करतो. पण प्रेमाची समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा तुमचा पार्टनर तुमचे म्हणणे समजून घेऊ शकत नाही. अशावेळी तुमचं नातं संपुष्टात येण्याची शक्यता असते. अशा स्थितीत दोघेही एकमेकांप्रती चुकीच्या भावना मनात बाळगू लागतात. एकास वाटते की माझ्या प्रेमाला काही किंमतच देत नाही तर दुसरा विचार करतो की, माझा पार्टनर माझे सर्व स्वातंत्र्यच हिरावून घेत आहे. मग अशी वेळ येते की त्यांना एकमेकांपासून दूर व्हावे लागते. अशीच वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून या सूचनांवर लक्ष द्या :

प्रत्येकक्षणी नजर ठेवू नका : बऱ्याचदा आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यावेळी त्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी असा विचार करत असतो. पण समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा गरजेपेक्षा जास्त लक्ष ठेवले जाते. अतिप्रेमामुळे पार्टनर वैतागून जातात. कारण तुम्ही प्रत्येकवेळी त्यांच्यावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर, झोपण्यावर, उठण्यावर, येण्याजाण्यावर नजर ठेवता. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांचे स्वातंत्र हिरावले जात असल्याची भीती निर्माण होते. ते स्वत:ला एका बंधनात बांधल्याचा अनुभव घेत असतात.

नात्याला स्पेस देणे : नाते कोणते का असेना, त्या नात्यात स्पेस असणे गरजेचे असते. नाहीतर त्या नात्याचे आयुष्य मर्यादित राहाते. नात्यात स्पेस न दिल्यामुळे प्रेम कमी होते आणि भांडण-तंट्यांमध्ये वाढ होते. यामुळे नात्यात जवळीकतेऐवजी दरी निर्माण होते.

प्रत्येकवेळी पार्टनरच्या सोबत राहणं : आपल्या पार्टनरवर अमाप प्रेम करणारे, त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वेळस असेही होऊ शकते की पार्टनरची त्याच्या मित्रमंडळींसह नातेवाईकांसह वेळ घालवण्याची इच्छा असू शकते. अशावेळी त्याच्यासाठी तुमचे प्रेम शिक्षा ठरू शकते.

अपेक्षांना सीमा असावी : बऱ्याचदा तुम्ही पार्टनरकडून खूपच अपेक्षा करू लागता. जर त्याचे माझ्यावर प्रेम असेल, त्याने माझ्या अपेक्षांवर खरे उतरलेच पाहिजे. अशा भावनांनी प्रेमाची परीक्षा घेणे, जेवढे तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तेवढेच प्रेम त्यानेही तुमच्यावर करावे. अशा अपेक्षांमुळे तुमच्या पार्टनरला बंधनात अडकल्यासारखे वाटते. मग अशावेळी ते या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात.

संशय घेऊ नका : तुमचा पार्टनर प्रत्येक छोटीछोटी गोष्ट तुम्हाला विचारून करेलच असे काही नाही. पण तरीही तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा ठेवू लागता की त्याने प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच करावी. तसेच तुम्ही प्रत्येकवेळी त्याला फोन कुठे आहे? काय करत आहे? असे विचारून प्रश्नांचा भडीमार करता आणि मनात संशयाची सुई निर्माण करता. त्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची बातमी ठेवता इत्यादी सर्व गोष्टींमुळे तुमचा पार्टनर हैराण होऊन जातो.

जवळीकतेला मर्यादा हवी : नात्यात मर्यादेपेक्षा अधिक जवळीकता निर्माण झाल्यावर, एकमेकांमध्ये तक्रारी होण्याच्या संभावना बळावतात. कारण काही वेळेस आपल्या माणसावर हक्क दर्शविणे हे आदेशासमान भासू शकते. म्हणूनच आपल्या पार्टनरवर अतिप्रेम करू नका. तर त्याला प्रेम द्या. म्हणजे मग त्याला स्वत:चे स्वत:लाच जाणवेल की तुमची आणि तुमच्या प्रेमाची किंमत काय आहे ते?

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रेम तुम्हा दोघांसाठी डोकेदुखी ठरू नये तर यासाठी पुढील बाबी लक्षात घ्या :

* तुमचे तुमच्या पार्टनरवर प्रचंड प्रेम आहे म्हणून ते त्याच्यावर लादू नका आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तर मुळीच करू नका.

* जेवढे प्रेम आणि काळजी तुम्ही तुमच्या पार्टनरची करता, तेवढेच प्रेम आणि काळजी त्यानेही करावी. अशी अपेक्षा मनाशी बाळगत असाल, तर प्रेम आणि काळजी कोणतीही अपेक्षा न ठेवता करणे कधीही चांगलेच ठरेल.

* प्रत्येकवेळी आपल्या पार्टनरच्या जोडीला राहू नका. तुमच्या प्रेमाची सीमा राखा.

* जर तुमच्या पार्टनरकडून तुमच्यावर दबाव टाकला जात असेल तर, त्याच्यापासून वेगळे होणे हा अंतिम पर्याय नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या पार्टनरला थोडा वेळ द्या. कोणत्याही दबावामुळे तुमचे नाते दीर्घकाळ टिकणे कठीण होईल.

* तुमच्याएवढे प्रेम तुमचा पार्टनर तुमच्यावर करू शकत नसेल किंवा तुमच्या मनाप्रमाणे प्रतिक्रिया देऊ शकत नसेल तर तुम्ही मनाशी धीर धरा आणि पार्टनरशी यासंबंधी संवाद साधा.

* दिवसागणिक नात्यात बदल येत राहतात. काळानुरूप अनेक गोष्टी बदलतच जातात. पण प्रेमासाठीच्या अपेक्षा तशाच जिंवत राहतात. अशावेळी तुम्ही नात्याला सावरत, त्या बदलांवर तुमच्या पार्टनरशी संवाद साधत राहणे.

* नेहमीच होणाऱ्या तंट्याने आणि रोखठोकीने नाते दीर्घकाळ टिकत नाही. प्रत्येक क्षणी पार्टनरवर लक्ष ठेवणे म्हणजे प्रेम नव्हे तर यामुळे तुमच्या पार्टनरच्या प्रति असलेला अविश्वास दिसून येतो.

कसे असावे नाते सासूसुनेचे

* मोनिका अग्रवाल

मुलांना मोठं होत असताना पाहून त्यांचे आईवडिल त्यांच्या लग्नाची स्वप्नं पाहू लागतात. मग कोणाच्या तरी मुलीला आपल्या घराण्याची शोभा बनवून आपल्या कुटुंबात घेऊन येतात. याचप्रमाणे मुलीला मोठी होताना पाहून तिच्या केवळ विवाहाच्या कल्पनेनं आईवडिल भावुक होतात. इतकेच नाही, स्वत: मुलगीसुद्धा तिच्या लग्नाच्या कल्पनेने, वेगवेगळ्या भावतरंगामध्ये गुंतलेली असते. ती फक्त पत्नीच नव्हे तर तरी सून, वहिनी, काकू, ताई, जाऊ अशी अनेक नाती निभावत असते.

लग्नाच्या काही काळानंतर न जाणे काय बदल घडतात, पण सासरच्यांना सुनेत दोषच दोष दिसून येतात. दुसरीकडे मुलगीही सासरच्या माणसांविषयी स्वत:चे विचार व वागणूक बदलते. काही कुटुंबांमध्ये तर ३६चा आकडाच निर्माण होतो. मुलीच्या सासरचे तर कुटुंबांतील प्रत्येक समस्येचे मूळ सुनेला आणि तिच्या कुटुंबाला समजू लागतात.

एकमेकांना समजून घ्या

एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. जेव्हा आपण एखाद्याची मुलगी आपल्या कुटुंबात घेऊन येतो, तेव्हा तिला तिच्या वडिलांच्या (जिथे ती लहानाची मोठी झाली) घरापेक्षा एकदम वेगळे वातावरण मिळते. मग ते राहण्यावागण्याबाबतीत असो किंवा खाण्यापिण्याच्या किंवा स्वभावाच्या बाबतीत. सर्वच दृष्टीने खूप बदल झालेला असतो.

याशिवाय पतिपत्नीचे आपापसातील संबंध समजून घ्यायलाही तिला थोडा अवधी लागतो. अशावेळी कुटुंबातील लोकांनी अपेक्षा थोड्या कमी ठेऊन सुनेला आपले मानून समजुतीने घ्यावे तर बहुधा समस्या निर्माण होणार नाहीत.

सुन घरी येण्याआधी सासू खूप अपेक्षा बाळगते जसे की सुन येईल आणि कामाचा ताण कमी होईल. ती सर्वांची सेवा करेल वगैरे.

सुनेचे घरातील कामात परिपूर्ण नसणे किंवा कमी काम करणे हा खूप मोठा दोष समजला जातो. प्रत्येक सासू हे विसरून जाते की सुरूवातीला सासरी आल्यावर जसा तिला पतिचा सहवास आवडत असे तसाच सुनेलाही हवाहवासा वाटणार.

मान देऊन मान मिळवा.

सासूसुनेचे संबंध मधुर बनून राहावेत यासाठी सासूच्या वागण्यात उदारता, धैर्य आणि त्यागाचे भाव असणे आवश्यक आहे. आपल्या प्रियजनांना सोडून आलेल्या सुनेसोबत मायेची वर्तणूकच तिला नव्या परिवारासोबत जोडू शकेल, तिला आपलेपणा वाटू शकेल आणि तिच्या मनात सन्मान आणि सहकार्याची भावना निर्माण करू शकेल. सुनेला फक्त काम करणारी मशीन न समजता कुटुंबाचे सदस्य मानले जावे.

सुनेच्या विचारांना व भावनांना महत्त्व दिले जावे. कुटुंबातील प्रत्येक निर्णयात तिचेही मत विचारात घ्यावे, जेणेकरून कुटुंबात सुखशांती व समृद्धी टिकून राहिल.

सासूने घरातील सर्व कामे सुनेला न सोपवता स्वत:सुद्धा काही काम केले तर सासूचे आरोग्य सुदृढ राहीलच, कुटुंबातील वातावरणही चांगले राहील.

तसेच लग्नानंतर मुलीचीही काही कर्तव्य आहेत, जी तिने पार पाडली पाहिजेत. मुलीला हे कळत नाही की कुठल्याही सदस्याकडून समजावले जाणे ही ढवळाढवळ नाही. घरातील थोडेसे कामसुद्धा तिला ओझे वाटू लागते. तिला असे वाटते की पतिवर तिचाच हक्क आहे. त्याने जर इतर कोणाला वेळ दिला तर तिला ती स्वत:ची उपेक्षा वाटते. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हटले तर सासरी अधिकार काय हे तर तिला माहित असते, पण कर्तव्यपालन करणे तिला ओझ्यागत भासते.

सासरीसुद्धा मुलीसारखे अधिकार मिळावेत असे वाटणे गैर नाही, पण कोणी काही हटकले की ती हे विसरून जाते की माहेरीसुद्धा असेच होते. हे खरं आहे की सासरी कुणाशीही (तिच्या मुलांशिवाय) तिचे रक्ताचे नाते नाही पण माणुसकी आणि प्रेमाचे नाते तर आहेच.

तिनेही हे सत्य मनापासून स्विकारायला हवे की थोड्या मेहनतीने सर्वांचे मन जिंकून ती सर्वांना आपलेसे बनवू शकते. नोकरदार मुलींना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ अधिक व्यतित करायला वेळ मिळत नाही. पण वेळ काढला जाऊ शकतो आणि कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनण्यासाठी काही कर्तव्य तिचीही असतात. कुटुंबीयांना आदर आणि प्रेम देऊन ती आपल्या पतीचे मन जिंकू शकते.

विवादापासून दूर राहा

खरंतर वर्चस्वाची लढाईच सासूसुनेमध्ये तेढ निर्माण करते. कुठल्याही संयुक्त कुटुंबात सासू आणि सुन बहुतांशी वेळ एकमेकींसोबत घालवतात. त्यांच्यावरच कामाची जबाबदारी असते. अशात घरात अशांततेचे मुख्य कारणही सासू आणि सुनेचे कटु संबंध हेच असते.

आज टीव्हीवर अनेक मालिका सासूसुनेच्या नात्यावरच आधारित असतात. दोघांपैकी कोणीतरी एक चाल खेळत असते. कधी नात्यांना उपहासात्मक विडंबन पद्धतीने सादर केले जाते. निरनिराळ्या सर्वेक्षण व शोधांमधून हे समोर आले आहे की संयुक्त कुटुंबामध्ये तणावाचे कारण ६० टक्के सासूसुनेतील नाते हेच असते.

ज्या घरांमध्ये मोठ्या चवीने या मालिका पाहिल्या जातात तिथेच वादविवाद जास्त होतात. ते तासन्तास त्यावर चर्चासुद्धा करतात की सासू किती चुकीचे वागत आहे. किंवा त्या कुटुंबातील सुन कशी चलाख आहे. तेव्हाच या सासूसुनेच्या मनातही हेच ठसते की मालिकेतील पात्रांप्रमाणेच वागायला पाहिजे आणि टीव्हीवर पाहिलेले सर्व आयुष्यातही उतरू लागते व स्वत:वर तशी वेळ आल्यास आपणही तसेच वागतो.

आपण सर्वच कुठल्या न कुठल्या चित्रपट किंवा मालिकेतील पात्रांशी स्वत:ला जोडून पाहतो व तसे बनण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कशी सासू बनायला आवडेल? ‘कुछ रंग प्यार के’ सिरीअल मधल्या ईश्वरीदेवीसारखी की ‘बालिका वधू’मधल्या दादीसारखी?

सुनेचे कुठले पात्र तुम्हाला सूट करते? तुम्ही सासूसुनेच्या कुठल्याही पात्राप्रमाणे वागा, पण एक प्रश्न स्वत:ला नक्की विचारा की घरातल्या कुठल्याही सदस्याला त्रास देऊन तुम्ही खूश राहू शकता का? कुटुंबातील सदस्यांचा आत्मसन्मान दुखावून तुम्ही स्वस्थ बसू शकता का? कुटुंब एका माळेसारखे आहे आणि यातील सदस्य मोती आहेत. मग ही नाती तोडून तुम्ही खुश राहू शकाल का?

सुनांनी शक्यतो कधी ज्येष्ठांशी वाद घालू नये. विवादस्पद परिस्थिती उद्भवू देऊ नये. आपले म्हणणे शांतपणे त्यांच्यासमोर मांडा. मुलाने समंजस्यपणे ही स्थिती हातळावी. एक गुणी मुलगा, पती आणि जावयाच्या रूपात हा समजूतदारपणा असावा.

मुंबई येथे राहणाऱ्या वाणीचे म्हणणे आहे, ‘‘मी तमिळ कुटुंबातील आहे आणि माझे लग्न एका पंजाबी कुटुंबात झाले. मला सासूची खूप भीती होती. माझ्या मैत्रिणींनी आणि नातेवाईंकांनी मला सासूविषयी खूपच घाबरवून सोडले होते. आमचं लग्न वेगळ्या धर्मात झाले होते. राहणेखाणे, वागणेबोलणे सर्व वेगळे होते. पण मी जितके घाबरत होते त्याच्या उलटच झाले.’’

‘‘माझ्या सासूने मला प्रेमाने सर्व करायला शिकवले. हिंदी बोलायला शिकवले. त्या मला सासू कमी आणि मैत्रीण जास्त वाटल्या.’’

दिल्लीची मधू सांगते, ‘‘मी अवघी १६ वर्षांची असताना आनंदाने माझ्या सासरी गेले. माझ्या मनात कुठलाही पूर्वग्रह आणि भीती नव्हती. मी ठरवले होते की कोणालाही उलट उत्तर देणार नाही. मग माझ्यावर कोणी का नाराज होईल?

‘‘सासूबाई तसे तर खूप प्रेमाने बोलत. मनातल्या मनात का कोणास ठाऊक मुलगा बदलेल अशी भीती त्यांना वाटत असे. त्यामुळे त्या माझ्या कामात काही ना काही चुक काढत असत. मी कुठलाही वादविवाद करत नसे, तरी गोष्टी हळूहळू चिघळू लागल्या.

‘‘सासूबाई आता बाहेरच्या लोकांसमोरही माझा पाणउतारा करू लागल्या. त्या प्रत्येक वेळेस माझ्याबद्दल वाईट बोलत असत. माझीही सहनशक्ती संपत होती. मी त्यांना उलट ऐकवायला लागले होते. यामुळे घरातील वातावरण बिघडू लागले होते. पती सतत तणावग्रस्त राहू लागले. ते ना आईला समजावून सांगू शकत होते ना मला.

‘‘यादरम्यान त्या आजारी पडल्या, पण जेव्हा मी त्यांची खूप सेवा केली तेव्हा त्यांचे मनपरिवर्तन झाले. माझ्या सेवेमुळे त्या माझ्यावर प्रेम करू लागल्या. त्यांचे मन परिवर्तन माझ्या सेवेमुळे झाले की माझ्या समजूतदारपणामुळे हे माहीत नाही, पण महत्त्वाचे हे आहे की आज घरातील वातावरण एकदम शांत आहे.’’

या दोन्ही प्रकरणांपेक्षा वेगळे प्रकरण आहे मोहिनीचे. ती सांगते, ‘‘माझे लग्न झाले आणि समस्यांचे सत्रच सुरू झाले. पूर्ण घरात सासूचे आणि नणंदेचे वर्चस्व होते. नुसते म्हणण्यापुरतेच नणंद विवाहित होती, पण प्रत्येकवेळी मला त्रास देत असे. मी सासूसासरे आणि नणंद या त्रिकोणात अडकून गेले होते.

‘‘पती नेहमी शांत असत. त्या दोघांच्या कुटिलपणामुळे आमच्यावर वेगळे होण्याची वेळ आली होती. पण अचानक परिस्थिती अशी बदलली की पतीच्याही लक्षात आले की कमतरता कुठे आहे.

‘‘नणंद आपल्या निढीवलेल्या वर्तनामुळे माहेरीच आहे. सासूबाईंनाही आता माझं महत्त्व पटलं आहे. मुलगी आणि सून यामध्ये एक पुसटशी रेषा असते. गरज असते ती फक्त रेषा पुसून टाकण्याची. मागे वळून पाहताना खूप दु:ख होते कारण महत्त्वाचा सोनेरी काळ लोटला होता. पण तरी समाधानाची बाब ही की उशिरा का होईना त्यांना त्यांची चूक समजली आहे.’’

परकी नाही स्वत:ची मुलगी समजावे

काही घरात सासूसुनेचे नाते माय लेकींसारखे असते तर काही घरात परिस्थिती खूपच वाईट असते. कमतरता ना सासूमध्ये असते ना सुनेत, कमतरता तर त्यांच्या समंजसपणात आणि त्यांच्या प्रेमात असते.

प्रश्न हा आहे की शेवटी सासूसुनेला परके का समजते? घरातली गोष्ट आहे असे असेल तर आपल्याला हेच ऐकायला आवडेल की घर तिचे आहे, पण घरांसोबत जबाबदाऱ्याही येतात.

दुसरीकडे काही सुना अशा असतात की त्यांना फक्त त्यांच्या नवऱ्याची आणि मुलांचीच जबाबदारी घ्यायची असते, सासूसासऱ्यांची नाही. याला घर सांभाळणे म्हणता येणार नाही.

वस्तूत: घर सर्व कुटुंबाचे असते. प्रत्येक सदस्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला हव्यात. घर फक्त सासूचे आहे म्हणणे किंवा मुलगा आणि त्याच्या पत्नीचे आहे असे म्हणणे चुक ठरेल. कारण घरात इतर लोकसुद्धा राहतात. कोणा एका व्यक्तीमुळे घर बनत नाही. घर पूर्ण कुटुंबामुळेच बनते.

लहान लहान बाबी लक्षात ठेवल्या तर कुटुंबाचे वातावरण सहज, सुखद आणि शांततापूर्ण राहू शकेल.

नवे नातेबंध, वर्क वाइफ, वर्क हझबंड

* वीणा सुखीजा

तुम्हाला त्याच्या मित्रांची नावं माहीत आहेत. तुम्हाला त्याच्या आवडत्या चित्रपटांची नावं ठाऊक आहेत. तुम्हाला त्याच्या जीवनात घडलेल्या अनेक विशिष्ट घटनांची माहिती आहे. तुम्ही त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता. कधीकधी तो तुम्हाला रागावतो. तरीदेखील तुम्ही त्याची कुणाकडेही तक्रार करत नाही, अगदी तुम्हाला याचं वाईटही वाटत नाही. तुम्हाला त्याच्या बोलण्याची लकब ठाऊक आहे. त्याच्या मनात काय सुरू असतं, याचाही तुम्हाला अंदाज असतो.

प्रश्न – अखेरीस तुमचा तो कोण आहे?

तुम्ही तिच्याकडून अपेक्षा बाळगता की तिने तुमच्या पसंतीचा पेहराव करावा. जेव्हा तुम्ही दोघे लंच करायला बसता तेव्हा तिने वाढावं अशी तुमची इच्छा असते. तुम्ही काही बोलत असाल, मग भले ते रागाने असेल तरी तिने ते निमूटपणे ऐकून घ्यावं, त्यावेळी उलट उत्तर देऊ नये, नंतर भले ती ओरडली तरी चालेल असं वाटतं.

तुम्ही तिला आपल्या भविष्यातील योजना सांगता, प्रवासादरम्यान घडलेल्या मजेदार गोष्टी सांगता. तुम्ही तिच्यासोबत बसून काम करण्याच्या उत्तम रणनीतीवर विचार करता.

प्रश्न – अखेरीस ती तुमची कोण आहे?

होय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पती आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पत्नी. परंतु थांबा, हे सामान्य जीवनातील पतिपत्नी नाहीत. हे वर्क हझबंड आणि वर्क वाइफ आहेत. वर्क हझबंड म्हणजे कार्यस्थळी वा कार्यालयातील पती. अशाचप्रकारे वर्क वाइफचाही अर्थ आहे. कार्यस्थळ वा कार्यालयातील पत्नी. ऐकायला हे भले थोडं विचित्र वाटत असेल वा संकोच वाटेल, परंतु वास्तव हेच आहे. कामाची नवी संस्कृती भरभराटीला येण्यासोबतच जगभरात अशा पतिपत्नींची संख्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांच्या जवळपास ४० टक्के आहे.

१९५०च्या दशकात अमेरिकेत अशा नात्यांसाठी मोठ्या शिताफीने एका शब्दाचा वापर केला जात असे – वर्क स्पाउज. हे वर्क वाइफ, वर्क हझबंड हे शब्द वास्तविक त्याचीच विस्तारीत रूपं आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की कार्यक्षेत्र जगतातील हे काही नवं नातं नाही. नवीन आहे ते इतकंच की या नात्याला जगाच्या बहुतेक देशांमध्ये स्पष्टरीत्या स्वीकारालं जाऊ लागलं आहे.

त्यामुळे आपण या नात्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याची काही गरज नाही. वर्षांनुवर्षांपासून जगात अशाप्रकारच्या संबंधांचं अस्तित्त्व आहे आणि का असू नये? हे खूप स्वाभाविक आहे की जेव्हा आपण दिवसातील बहुतेक कालावधी सोबत व्यतित करतो तेव्हा तिथे भावनिक नातं का विकसित होणार नाही?

ऑस्कर वाइल्डने म्हटलं होतं, ‘‘स्त्री आणि पुरुषात सर्व प्रकारची नाती असू शकतात, परंतु केवळ मैत्री असू शकत नाही. मित्र असूनही त्यांच्यात स्त्री आणि पुरुषाचं नातं विकसित होतं.’’

मनोविश्लेषकही सांगतात की जेव्हा दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकमेकांसोबत आकर्षण अनुभवतात, तेव्हा त्यांचं हे आकर्षण त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वभावधर्मानुसार आकार घेऊ लागतं म्हणजे पुरुष हा पुरुष होतो आणि स्त्री, स्त्री होते.

पूर्वीसुद्धा होते असे नातेबंध

असे नातेबंध नेहमीच अस्तित्वात होते आणि जोपर्यंत स्त्री आणि पुरुष सोबत असतील तोपर्यंत ते कायम राहातील. असे नातेबंध पूर्वीसुद्धा होते, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी होतं, याचं कारण होतं त्या काळात स्त्रियांचं घरातून बाहेर पडणं कठीण होतं. कार्यालयात साधारणपणे पुरुषच असायचे. परंतु आता काळ बदलला आहे. आजच्या जमान्यात स्त्री आणि पुरुष दोघेही घराबाहेर पडून सोबत काम करत आहेत. दोघेही घराऐवजी कार्यालयात अधिक वेळ व्यतित करतात. कामाची संस्कृतीसुद्धा काहीशी अशीच विकसित झाली आहे की सर्व कामं सोबत एकत्रित करावी लागतात. त्यामुळे एकाच कार्यालयात काम करत २ भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये व्यवसायासोबत भावनिक जवळीक वाढणंसुद्धा खूप स्वाभाविक आहे.

एक काळ होता, जेव्हा कार्यालयाचा अर्थ होता केवळ ८ तास. परंतु आज कार्यालयासाठी ८ तास पुरेसे नाहीत. आजच्या घडीला व्हाइट कॉलर नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यालयाचा अर्थ आहे एक निश्चित टार्गेट पूर्ण करणं, ज्यामध्ये दररोजचे १२ ताससुद्धा लागू शकतात आणि कधीकधी सलग २४ ते ३६ तासही सोबत काम करावं लागू शकतं.

असं यासाठी आहे; कारण अर्थव्यवस्था बदलली आहे, जग मर्यादित झालं आहे आणि वास्तविकतेहून गोष्टी अधिक आभासपूर्ण झाल्या आहेत. निश्चितच दीर्घ काळ कार्यालयात सोबत राहाणाऱ्या दोन व्यक्ती आपली सुखदु:खंही एकमेकांना सांगतात; कारण जेव्हा दोन व्यक्ती सोबत राहून काम करतात, तेव्हा ते आपसांत हसतात, सोबत जेवतात, एकमेकांच्या कुटुंबाविषयी ते बोलतात, ऐकतात, बॉसला एकमताने दूषणं देतात आणि ताजंतवानं राहाण्यासाठी परस्परांना चुटकुलेही ऐकवतात. हे सर्व एका छोट्याशा केबिनमध्ये घडत असतं, जिथे २ सहकारी अगदी बाजूबाजूला बसत असतात.

अशा परिस्थितीत ते एकमेकांना कळतनकळत प्रत्येक गोष्ट शेअर करतात. सहकाऱ्याला कोणतं संगीत आवडतं हे तुम्हालाही माहीत असतं आणि त्यालाही. त्याला चॉकलेट आवडतं की आइस्क्रीम ही गोष्ट दोन्ही सहकाऱ्यांना चांगलीच ठाऊक असते. निश्चितच आकर्षणाचे बंध या सर्व धाग्यांमुळे जुळतात.

काम करताना बराच काळ सोबत व्यतित होतो, तेव्हा आपण एकमेकांच्या केवळ क्षमताच नव्हे, तर मानसिक जडणघडण आणि भावनिक बाजूही व्यवस्थित समजून घेतो. परिणामी दोन भिन्नलिंगी व्यक्ती परस्परांच्या पूरक बनतात. त्यांचं एकमेकांसोबत भांडण होत नाही. दोघे एकत्रित काम करतात तेव्हा कामही जास्त होतं आणि थकवाही जाणवत नाही. दोघे सोबत एकत्रित खूश राहातात म्हणजे असे सहकारी पतिपत्नींप्रमाणे काम करू लागतात. त्यामुळे अशा लोकांना समाजशास्त्रामध्ये परिभाषित करण्यासाठी वर्क हझबंड आणि वर्क वाइफ श्रेणीमध्ये ठेवलं जातं.

प्रमाण वाढत आहे

पूर्वी याला सैद्धांतिक स्वरूपात मानलं आणि समजून घेतलं जात होतं. परंतु संपूर्ण जगात प्रसिद्ध करिअर वेबसाइट वॉल्ट डॉट कॉमने एक सर्वेक्षण केलं आणि आढळलं की २०१० मध्ये असे वर्क हझबंड आणि वर्क वाइफ जवळपास ३० टक्के होते, जे २०१४मध्ये वाढून ४४ टक्के झाले आहेत.

या अभ्यासात सहभागी लेखकांनी एक अतिशय परिचित उदाहरण देऊन जगाला समजावण्याचा प्रयत्न केला की वर्क वाइफ आणि वर्क हझबंड कसे असतात? उदाहरण हे आहे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश व त्यांच्या परदेश मंत्री व राष्ट्रीय सल्लागार असलेल्या कोंडालिझा राइस यांच्यात जी कामासंदर्भातील केमिस्ट्री होती, ती वर्क हझबंड वा वर्क वाइफच्या पठडीतील केमिस्ट्री होती.

कितपत नैतिक आहे हे नातं?

प्रश्न हा आहे की हे नातं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? हे नातं विश्वासार्ह आहे का? वॉल्ट डॉटकॉमचा सर्वेक्षण निष्कर्ष या गोष्टी समोर आणतं की लोक हे एक महत्त्वपूर्ण आणि मजबूत नातं असल्याचं मानतात. या सर्वेक्षणादरम्यान आवडत्या सहकाऱ्यासोबत जे नातं बनतं ते अधिक विश्वासार्ह आणि अधिक मजबूत असतं. लोक ही नाती आनंदाने निभावतात. जवळपास तसंच जसं एखादं विवाहित जोडपं आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करतात. या नात्याला पश्चिमेकडे समाजशास्त्रज्ञांनी व्यवहारिकतेच्या अनेक कसोट्यांमध्ये ठेवून दाखवलं आहे आणि त्यांना आढळून आलं की हे नातं केवळ खासच नव्हे, तर अतिशय सामंजस्याने परिपूर्णसुद्धा असतं.

या नात्यात रोमान्य नसतो फक्त जोडप्याचं एकमेकांसोबत भावनिक बंध असतात आणि एकमेकांच्या समस्या आणि वास्तव यांची योग्य जाण ठेवून ते हे नातं निभावत असतात. वास्तविक बहुतेक अशी जोडपी जी अशा नातेबंधांच्या आवाक्यात येतात, ते शारीरिकसंबंधात खोल उतरत नाहीत. परंतु थोडीबहुत जवळीक सर्वांची असतेच, मात्र समाजशास्त्रज्ञांना आपल्या व्यापक विश्लेषणामध्ये हे आढळून आलं की ज्या जोडप्यांमध्ये शारीरिकसंबंधसुद्धा असतात, तेसुद्धा एकमेकांच्या वास्तविक परिस्थितीचा सन्मान करतात आणि गरज भासल्यास कोणताही राग-द्वेष, बाचाबाची न करता अतिशय सहजतेने एकमेकांपासून अंतर राखतात.

प्रोफेसर मॅक्सब्राइट ज्यांनी या सर्वेक्षणाचं सविस्तर विश्लेषण केलं, त्यांच्यानुसार खूप कमी लोकांमध्ये या कामकाजी नातेबंधांसह रोमान्सचं नातं असतं.

अखेरीस या नात्याचा फायदा काय हा प्रश्न आहे? या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मानले आणि सर्वेक्षणादरम्यान लोकांनी केलेल्या मुलाखतीतून मिळालेल्या निष्कर्षावर विश्वास ठेवला तर जेव्हा २ सहकाऱ्यांमध्ये वर्क वाइफ वा वर्क हझबंडचं नातं बनतं, तेव्हा ते दोन्ही कर्मचारी आपल्या कामाप्रति जास्त प्रामाणिक होतात आणि त्यामुळे कामही अधिक प्रमाणात होतं. हेच कारण आहे की जगातील सर्व मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्क वाइफ, वर्क हझबंडचं नातं निर्माण व्हावं असं वाटत असतं.

आज जगातील सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या प्रकारचं आरामदेय कार्य वातावरण प्रदान करतात आणि कार्यालयात ज्याप्रकारे स्त्रिया आणि पुरुषांना जवळपास समान प्रमाणात ठेवतात, त्यामागे एक विचार हासुद्धा असतो की सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली जोडी निश्चित करून काम करावं.

मानसतज्ज्ञांच्या मते जेव्हा पुरुष आणि स्त्रिया सोबत बसून काम करतात, तेव्हा त्यांच्यात काही कारण नसताना, १० टक्के आनंदी भावना असते अर्थात जेव्हा एकटा पुरुष वा एकटी स्त्री काम करतात, तेव्हा ते कामाने लवकर कंटाळतात. त्यांचं कार्य उत्पादनही कमी असतं आणि काम करण्याचा उत्साह वा रोमांचही जाणवत नाही.

परंतु जेव्हा महिला आणि पुरुष मिळून सोबत काम करतात, तेव्हा त्यांना एक प्रकारच्या आंतरिक आनंदाची अनुभूती होते, भले या आनंदाला काही अर्थ नसेल. वास्तविक २ भिन्न लिंगी व्यक्ती एकत्रित वेळ व्यतित करताना एकमेकांना अनोखी उर्जा प्रदान करत असतात.

कामाची गुणवत्ता वाढते

सर्व सर्वेक्षणं आणि संशोधनांमध्ये हेसुद्धा आढळून आलं आहे की जेव्हा स्त्रिया आणि पुरुष एकत्रित काम करतात, तेव्हा ते नेहमीच्या तुलनेत अधिक काम करतात, शिवाय उत्तम प्रतिचं कामही करतात. सोबतच नवनवीन कल्पनाही विकसित करतात. बहुराष्ट्रीय कंपन्या याच रणनीतीअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना आपसांत मिळूनमिसळून राहाण्यायोग्य वातावरण तयार करण्यासाठी बहुतेकदा पार्ट्या आयोजित करतात. कर्मचाऱ्यांसाठी आल्हाददायक वातावरण तयार करतात जेणेकरून सगळे एकमेकांच्या कमतरता आणि कौशल्य ओळखू शकतील, शिवाय कर्मचाऱ्यांना आपल्या पसंतीनुरूप अनुकूल साथी निवडण्यास अडचण होणार नाही.

वर्क हझबंड आणि वर्क वाइफचा ट्रेण्ड वेगाने फोफावत आहे. वास्तविक भारतासारख्या समाजव्यवस्थेतच नव्हे, अमेरिका आणि युरोपसारख्या समाजातही या शब्दांचा वापर करायला कर्मचारी संकोचतात. विवाहित वा अविवाहित दोन्ही प्रकारचे कर्मचारी आपल्या कुटुंबामध्ये आणि मित्रांमध्ये या शब्दाचा वापर चुकूनही करत नाहीत. इतकंच नव्हे तर, आपसांतही ते कधी या शब्दाचा वापर करत नाही वा एकमेकांना दर्शवत नाहीत की हो, असं आहे. परंतु ते एकमेकांशी याच भावनेने जोडलेले असतात, ही गोष्ट दोघांनाही ठाऊक असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें