* मिनी सिंह
भारतात सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर नागरिकत्वाच्या मुद्द्यावर चर्चा जोरात सुरू आहे. सीएएच्या माध्यमातून भारत शेजारील ३ देशांतील गैर-मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देईल, पण एक सत्य असेही आहे की, एकीकडे भारत शेजारील देशांतील लोकांना नागरिकत्व देणार आहे तर दुसरीकडे दरवर्षी लाखो भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून विदेशी नागरिकत्व स्वीकारत आहेत.
अलीकडेच, केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सांगितले की, २०२१ मध्ये सुमारे १.६३ लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. २०२० मध्ये सुमारे ८५ हजार २५६ लोकांनी आपले नागरिकत्व सोडले. २०१९ मध्ये १.४ लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ९.२४ लाख भारतीयांनी देश सोडला आणि ते विदेशी नागरिक झाले. २१ डिसेंबर २०२३ रोजी, ३०३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान, ज्यात बहुतांश भारतीय होते, ते सर्व मानवी तस्करीचे शिकार असल्याच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आले. हे विमान संयुक्त अरब अमिरातीहून मध्य अमेरिकन देश निकाराग्वाला जात होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या विमानातील ६६ प्रवासी गुजरातचे तर इतर पंजाबचे होते. या प्रवाशांमध्ये ११ अल्पवयीन मुलांचाही समावेश होता.
अवैध प्रवेश
यावरून असे दिसून येते की, पंजाब आणि गुजरातमधील गरीब खेड्यांतील हे प्रवासी बेकायदेशीरपणे अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्याच्या उद्देशाने निकाराग्वाला जात होते. ‘डंकी विमान’ भारतात परत पाठवल्यानंतर काही आठवड्यांनी, गुजरात पोलिसांनी निकाराग्वा सीमेवरून भारतीयांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत हलविणाऱ्या १४ दलालांवर गुन्हा दाखल केला. यातील बहुतांश दलाल गुजरातमधील होते तर काही दिल्ली, मुंबई आणि दुबईतील होते. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी या दलालांनी प्रवाशांकडून ६० ते ८० लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले. प्रवाशांनी ते खलिस्तानी आहेत, असे सांगावे आणि पोलिसांनी सीमेवर पकडलेच तर त्यांनी अमेरिकेचा आश्रय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी प्रवाशांना दिल्या होत्या.
त्या विमानातील सर्व गुजरातींना गुजरातला परतायचे नव्हते, असेही सूत्रांकडून समजले. येथून फक्त निकाराग्वाला जाणार यावर ते ठाम होते तर सुमारे १२ प्रवासी फ्रान्समध्ये आश्रय मागत होते.





