* रेणू गुप्ता
‘‘शेफाली, आजकाल तू खूप शांत आणि उदास दिसत आहेस. काही समस्या आहे का?’’ शेफालीची जवळची मैत्रीण, मनदीप, जिचे नुकतेच लग्न झाले होते, तिने शेफालीला विचारले.
‘‘नाही, नाही, काहीच नाही.’’
‘‘मला खरं वाटत नाही, काहीतरी आहे जे तुला त्रास देत आहे. तू आता पूर्वीसारखी बडबड करत नाहीस. नेहमीच कुठेतरी हरवल्यासारखी आणि उदास राहातेस. तू आता माझी ती पूर्वीची सतत बोलणारी आणि मोठ्याने हसणारी मैत्रीण राहिली नाहीस. मला सांग काय झालं? अगं, मी तुझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. कुणाच्या प्रेमात तर पडली नाहीस ना?’’
मनदीपने शेफालीला थोडेसे चिडवत विचारले. तेव्हा ती मोठ्याने म्हणाली, ‘‘अगं, हेच तर दु:ख आहे, की मी असे काहीही केले नाही. हे माझे पीएचडीचे पहिले वर्ष आहे आणि माझी आजी माझे लग्न लावण्यासाठी माझ्या वडिलांच्या मागे लागली आहे, पण सध्या मी लग्नासाठी अजिबात तयार नाही.’’
‘‘म्हणून मी माझ्या वडिलांना आणि आजीला स्पष्टपणे सांगितले की, आधी मी माझी पीएचडी पूर्ण करेन, नंतर चांगली नोकरी मिळवेन. त्यानंतरच मी लग्न करेन. लग्नापूर्वी मला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे आणि हेच कारण आहे की माझे वडील आणि आजी घरात नेहमीच वाद घालतात.’’
‘‘तुझे बरोबर आहे, लग्नानंतर मुलींवर इतक्या जबाबदाऱ्या येतात की, त्या स्वत:साठी काहीही विचार करू शकत नाहीत. माझ्याकडे बघ, पदवीनंतर मी इंटिरियर डिझायनिंगचा अभ्यास करावा आणि इंटिरियर डिझायनर व्हावे, स्वतंत्र व्हावे, माझी स्वत:ची ओळख असावी अशी माझी खूप इच्छा होती, पण माझे वडील हृदयरोगी असल्याने, मला वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी लग्न करावे लागले.
‘‘आता आयुष्य घरकाम आणि स्वयंपाकापुरते मर्यादित आहे. माझा पती महिन्यातून २० दिवस कामानिमित्त घराबाहेर असतो, त्यामुळे मला कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. माझे वृद्ध सासरेही आमच्यासोबत राहातात. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी तुला इतक्या लवकर लग्नाच्या जाळ्यात अडकण्याचा सल्ला कधीच देणार नाही. स्वावलंबी असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्य फक्त एकदाच मिळते.





