मूठभर जमीन ओंजळभर आकाश

कथा * ऋतु गुप्ते

फरहा पाच वर्षांनंतर आपल्या गावी परतून आली होती. विमानातून उतरताना तिने एक दीर्घ श्वास घेतला. जणू गेल्या पाच वर्षांतलं सगळं आयुष्य ती एकाच श्वासात जगून घेणार होती. पाच वर्षांत विमानतळाचा पूर्णपणे कायाकल्प झाला होता. बाहेर येताच तिने टॅक्सी केली अन् ड्रायव्हरला घराचा पत्ता सांगितला. तिच्या वडिलांचं घर हिंदपीढी भागात होतं.

पाच वर्षांत शहरात बराच बदल झाला होता. ते बघून फरहाला बरं वाटलं. वाटेत मल्टिफ्लेक्स अन् मॉलही दिसले. रस्ते पूर्वीपेक्षा रुंद अन् स्वच्छ वाटत होते. जीन्स टीशर्ट, स्कर्ट अन् टॉप घातलेल्या मुली बघून तिला सुखद आश्चर्य वाटलं. किती बदललंय हे शहर?

तिचा मुलगा रेहान टॅक्सीत बसताच झोपी गेला होता. फरहाने पण पाय थोडे पसरून सीटवरच स्वत:ला थोडं आरामशीर केलं. ऑस्ट्रेलियातून विमानं बदलत दिल्ली अन् आता तिथून टॅक्सीने आपल्या घरी. एवढ्या लांबलचक विमानप्रवासाने अंग आंबून गेलं होतं. आठवड्यापूर्वीच तिचे अब्बू रिटायर झाले होते. आता परत मूळ शहरात येऊन त्यांना इथे सेटल व्हायचं होतं. त्याच्या मदतीसाठीच फरहा काही दिवस त्यांच्याजवळ राहाणार होती. नव्या ठिकाणी, मग ते आपलं मूळ गाव का असेना, स्थायी होताना अनेक गोष्टींना सामोरं जावंच लागतं.

अचानक टॅक्सीवाल्याने ब्रेक दाबला. दचकून फरहा भानावर आली. तिची टॅक्सी हिंदपीढी भागात प्रवेश करत होती. रस्ते अत्यंत दयनीय परिस्थितीत होते. टॅक्सी डोलबाईडोल करत होती. सहज तिने खिडकीची काच खाली केली अन् भस्सकन् घाणीचा झोत अंगावर आला. पटकन् तिने काच बंद केली. शहराची प्रगती अजून या भागात पोहोचलीच नव्हती. रस्ते अजूनच अरुंद अन् गलिच्छ वाटत होते. अधूनमधून तयार झालेली घरं कुत्र्याच्या छत्र्या उगाव्यात तशी दिसत होती. तिच्या अब्बांचं दोन मजली घर मात्र तसंच दिमाखात उभं होतं.

अम्मी अन् अब्बू घराच्या बाहेरच तिची वाट बघत उभे होते.

‘‘अगं, अजूनही तुझा फोन बंद आहे…राकेश कधीचा काळजी करतोए, तू पोहोचलीस की नाहीस म्हणून?’’ अब्बूंनी तिला म्हटलं. त्यांना त्यांच्या जावयाचा प्रचंड अभिमान होता.

फरहाला जाणवलं बंद दारंखिडक्यांच्या फटीतून किती तरी डोळे तिच्याकडे बघाताहेत.

फ्रेश होऊन आरामत बसत फरहाने चहाचा कप हातात घेतला अन् ती अब्बूचं घर, त्यांची आळी व इतर गोष्टींचं निरीक्षण करू लागली.

सलमा नावाची विशीतली एक मुलगी भराभर घरकाम आवरत होती.

‘‘अब्बू कसं वाटतंय आपल्या घरात आल्यावर? अम्मी मात्र मला खूपच थकल्यासारखं वाटतेय. मागच्या वर्षी आमच्याकडे सिडनीला आली होती तेव्हा छान दिसत होती.’’

एक दीर्घ श्वास घेऊन अब्बू विषण्णपणे म्हणाले, ‘‘इथलं काहीही बदललेलं नाही. फक्त प्रत्येक घरात मुलं खूप वाढलीत. गल्लीत टवाळ पोरं जास्त दिसतात, मुली अजूनही जुन्या विचारांच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या आहेत. मात्र तुझ्या लग्नाची गोष्ट आता लोक विसरले आहेत.’’

फरहाने आतल्या खोलीत डोकावून बघितलं. तिची अम्मी अन् अम्मीचा नातू मजेत खेळत होते.

‘‘अब्बू, मला ना, फार भीती वाटत होती मोहल्ल्यातली, जवळपासची माणसं तुमच्याशी नीट वागतील ना? त्रास देऊन, अपमान करून छळणार तर नाहीत ना? त्या काळजीपोटीच मी आत्ता आलेय. आठ-दहा दिवसांत राकेशही येणार आहेत.’’

काही क्षण शांततेत गेले. मग ती अब्बूंजवळ येऊन बसली. ‘‘फूफी (आत्या) कशी आहे?’’

‘‘सोड गं, जे झालं ते झालं. तू आता विश्रांती घे. प्रवासाने दमली असशील.’’ अब्बू तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाले.

आतल्या खोलीत अम्मी रेहानला जवळ घेऊन पडली होती. तीही अम्मी शेजारी जाऊन आडवी झाली. दमली होती ती पण झोप लागेना. खोलीत चारी बाजूंनी जणू आठवणीचं पेव फुटलं होतं. चांगल्या आठवणी मनाला दिलासा देत होत्या, तर वाईट आठवणींनी मन रक्तबंबाळ होत होतं.

अब्बा सरकारी नोकरीत उच्च पदावर होते. काही वर्षांत त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली व्हायची. फरहाला त्यामुळे लहान वयातच हॉस्टेलला राहावं लागलं. अब्बू तिच्या शिक्षणाच्या बाबतीत फार दक्ष होते. अम्मी मुळातच नाजूक प्रवृत्तीची होती. तिला फार श्रम झेपत नव्हते. पण अम्मी अब्बूंचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. अब्बा जेव्हा पाटण्याला होते तेव्हा फूफी त्यांच्याकडे राहायला आली होती. तो प्रशस्त बंगला, सुंदर बाग, दिमतीला असणारी खानसामा, माळी, धोबी व इतर गडी माणसं, सरकारी गाड्या, अब्बांचा आदरयुक्त दरारा हे सगळं बघून ती भारावली. तिनं अब्बांचा दुसरा निकाह करण्याचा घाट घातला. ‘‘तुला मुलगा नाही. ही आजारी बायको तुला मुलगा देऊ शकणार नाही. तू दुसरं लग्न कर.’’ तिने अम्मीच्या समोरच अब्बांना सांगितलं तिच्या नात्यातली कोणी नणंद होती. इतर नातलगही फूफीच्याच बाजूचे होते. फार हिमतीनं अब्बूंनी हा प्रसंग निभावून नेला होता. फरहा मोठी झाल्यानंतर केव्हा तरी अम्मीनं हे सगळं तिला सांगितलं होतं. शिकलेल्या अब्बांना जुन्या रूढी आवडत नव्हत्या.

त्यामुळेच फरहाच्या घरातलं वातावरण इतर नातलगांच्या घरापेक्षा वेगळं होतं. अब्बू प्रगतिशील विचारांचे होते. ती एकटीच मुलगी होती तरी त्यांनी तिला उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली होती. तिच्या चुलत, मामे, आते, मावस बहिणीची लग्नं खूपच लवकर झाली. तिच्यापेक्षा धाकट्या बहिणींची लग्न झाली तरी फरहा शिकत होती. ती इंजिनीअर झाल्यावर तिला अब्बूंनी मॅनेजमेंटच्या पदवीला घातलं होतं.

ती इंजिनीअरिंगच्या फायनलला असतानाच एकदा फूफी घरी आली होती. आल्या आल्या तिने अम्मीला फैलावर घेतलं. लेकीचं वय वाढतंय अन् अजून तुम्ही तिच्या लग्नाचं बघत नाहीए. ‘‘भाभीजान मी सांगते तुम्हाला, फरहाला इतकं वय वाढेतो कुवार ठेवलीत, आता तिला मुलगा मिळणारच नाही. आता ओळखीत, नात्यात कुणी मुलगा लग्नाचा उरला नाहीए. भाईजाननाही काही कळत नाही. मुलींना एवढं शिकवायची गरजच काय मी म्हणते? मुलींची लग्न करायला हवीत. माझाच मुलगा आहे लग्नाचा. तुम्ही बघितलात ना? कसा गोरापान आहे. दुबईत पैसा मिळवतोए. फरहानची अन् त्याची जोडी चांगली दिसेल.’’

अम्मी बिचारी नातलगांच्या गराड्यात तशीच भरडून निघायची अन् फूफीच्या ओरडण्यामुळे तिचं बी.पी. अजूनच वाढलं. पण अब्बूंनी हे सगळं ऐकलं आणि फूफीला चांगलंच झापलं.

‘‘रझिया, तू काय विवाह मंडळ चालवतेस की काय? आधी माझ्या लग्नासाठी. आता माझ्या मुलीच्या लग्नासाठी सतत स्थळं आणतेस ती? अगं आपल्या लाडक्या पोरांची काळजी घेतली असतीस तर तुझ्या पोराला दुबईत पेट्रोलपंपावर नोकरी नसती करावी लागली. फरहाचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तिचं लग्न होणार नाही.’’

बरेच दिवस मुक्काम?ठोकण्याच्या बेताने आलेली फूफी त्याच दिवशी गाशा गुंडाळून निघून गेली.

अशीच विचारात असताना फरहाला केव्हातरी झोप लागली. सकाळी जाग आली. सकाळी सलमाने विचारलं, ‘‘फरहा बाजी. झोप झाली का? चहा आणू?’’ सलमाने चहा आणला अन् तिच्याजवळच बसली. ती खूप लक्षपूर्वक फरहाकडे बघत होती.

‘‘बाजी, तुम्ही आता कुंकू लावता? रोजे ठेवता की नाही? तुमचं नावंही बदललंय का?’’ निरागसपणे सलमाने विचारलं.

‘‘नाही…काल मी काम करून जात होते ना तेव्हा आपल्या मोहोल्ल्यातली माणसं मला विचारत होती. तुम्ही काफिरशी लग्नं केलंत ना?’’

अब्बूने फूफीला परत पाठवलं तरी प्रश्न सुटला नव्हताच. रोजच तिचं शिक्षण आणि वाढतं वय यावर चर्चा व्हायच्या. अब्बूंनी तर हल्ली या घरी येणंही कमीच केलं होतं. भारतातल्या बेस्ट कॉलेजमध्ये ती मॅनेजमेण्टचा अभ्यास करत होती. मुळात या अभ्यासक्रमाला मुली कमीच होत्या. मुस्लिम मुलगी तर ती एकटीच होती. कॉलेजच्या सगळ्याच कार्यक्रमात ती भाग घ्यायची. बक्षिसं मिळवायची. अभ्यासातही ती चांगली असल्याने शिक्षकांचीही लाडकी होती. याच काळात राकेश भेटला. अनेक प्रोजक्ट दोघांनी मिळून पूर्ण केले. त्याची हुशारी, समजूतदारपणा अन् मदत करण्याची वृत्ती यामुळे फरहाला तो आवडू लागला.

इंटर्नशिपनंतर आठ दिवसांनी फरहा घरी आली होती. त्यावेळी अब्बूंचं पोस्टिंग दिल्लीला होतं. अब्बू अम्मी दोघंही आनंदात होती.

‘‘फरहा, आता काही दिवसांत तुझी इंटर्नशिप संपेल. माझे मित्र रहमान यांनी त्यांच्या मुलासाठी तुला मागणी घातली आहे. आम्हाला तो मुलगा व सगळं कुटुंब पसंत आहे. अर्थात्च निर्णय तू घेणार आहेस.’’

त्या एका क्षणात जणू वादळ घोंघावलं. पण स्वत:ला कसंबसं सावरून ती म्हणाली, ‘‘तुमचा निर्णय मला मान्य असेल, अब्बू.’’

‘‘शाब्बास पोरी, माझी लाज राखली. लोक म्हणतात मुली आईबाबांचं ऐकत नाही, पण तू माझं ऐकशील याची मला खात्री होती. मी उद्याच रहमान अन् त्याच्या कुटुंबाला जेवायला बोलावलंय.’’

स्वप्न पडायला सुरुवात झाली नाही तोच झोप मोडली. फरहा रात्रभर रडत होती. तिला जाणवलं की ती अन् राकेश एकत्र येऊ शकणार नाही. दोन समांतर रेषा आहेत. त्या तशाच राहाणार. अब्बूंनी सगळ्या समाजाशी भांडून तिला एवढी शिकवली. आता जर तिने हिंदू मुलाशी लग्न केलं तर लोक कधीच मुलींना शिकू देणार नाहीत. तिला फक्त तिच्यापुरता विचार करून भागणार नाही. हे तिला राकेशला समजावून सांगावं लागेल.

दुसऱ्याच दिवशी रहमान आणि त्यांचे कुटुंबीय घरी आले. फक्त बघण्याचा औपचारिक कार्यक्रम होता तो. बाकी सर्व गोष्टी आधीच ठरवून झाल्या होत्या बहुतेक.

अब्बू अम्मीला सांगत होते. ‘‘समीना, आज मी फरहाच्या बाबतीतलं शेवटचं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान अनुभवतो आहे. खूप आनंद झालाय मला. फरहाची इंटर्नशिप पूर्ण झाल्यावरच आपण तिचा निकाह लावू. त्याचवेळी सगळ्या नातेवाईक व परिचितांनाही सांगू. सध्या कुणाला काहीच सांगायला नकोय.’’

दोन दिवसांनी फरहा आपल्या कॉलेजात आली. तिला राकेशला भेटून खूप रडून घ्यायचं होतं. पण राकेश समोर आला तोच त्रस्त, उदास अन् खूप थकलेला असा दिसला. आपलं दु:ख विसरून फरहा त्याच्या दु:खाबद्दल विचारू लागली.

‘‘फरहा, मी घरी तुझ्याबद्दल बोललो. पण तुझं नाव ऐकताच माझ्या घरात वादळ उठलं. मुस्लिम मुलगी घरात सून म्हणून येणार ही कल्पनाच त्यांच्या पचनी पडत नाहीए. मी सगळ्यांशी खूप भांडून आलोय. फरहाशिवाय मी इतर कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही असं सांगून आलोय.’’ राकेशने आपल्या मनातला संताप व्यक्त केल्यावर फरहानेदेखील तिच्या मनातली खळबळ त्याला सांगितलं.

दिवस उलटत होते. राकेश व फरहाला नोकरी दिल्लीतच मिळाली. एक हिंदू मुलगा व एक मुस्लिम मुलगी यांचं लग्न होऊ शकत नाही हे दोघांनीही मान्य केलं होतं.

फरहाच्या निकाहची तारीख नक्की करून गुडगावहून दिल्लीला येत असताना फरहाच्या गाडीला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. फरहा, अब्बा, अम्मी तिघेही जखमी झाले. बेशुद्ध पडण्यापूर्वी फरहाने राकेशला फोन केला.

अम्मी अब्बूच्या जखमा बेतात होत्या. पण फरहाच्या चेहऱ्यात काचा घुसल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती. नाकाचं अन् हनुवटीचं हाड मोडलं होतं. सुर्दैवाने डोळे शाबूत होते. पण सगळा चेहरा बँडेजने झाकला गेला होता.

अपघाताची बातमी कळताच रहमान अन् त्यांचा मुलगा व पत्नीही भेटायला आले. हात व पाय प्लास्टरमध्ये, चेहऱ्यावर भयानक दिसणारं बँडेज बघून रहमानच्या मुलाने डॉक्टरांना तिच्या समोरच विचारलं, ‘‘ही पूर्वीसारखी सुंदर दिसेल ना?’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘हातपाय तर लवकरच पूर्वीसारखे होतील पण चेहऱ्याचं सांगता येतत नाही. प्लॅस्टिक सर्जरीचा पर्याय अर्थात्च आहे. पण त्याला वेळ लागेल.’’

तो दिवस की आजचा दिवस रहमानकडून कुणीही पुन्हा फिरकलंच नाही. फक्त निकाह होऊ शकत नाही एवढा निरोप फोनवर दिला.

ठरलेलं लग्न मोडलं याचा अम्मी अब्बूला खूपच धक्का बसला. त्यातल्या त्यात एवढंच समाधान होतं की लग्न ठरण्याची बातमी अजून कुणाला कळवली नव्हती. नाही तर लोकांना बोलायला आणखी एक विषय मिळाला असता. तरीही सध्या सगळ्यात महत्त्वाचं होतं फरहाचं पूर्णपणे बरं होणं. या सगळ्या कठीण परिस्थितीत राकेश मात्र पहाडासारखा त्यांच्या पाठीशी होता. हॉस्पिटलमध्ये तिघांना डबे नेऊन देणं, स्वत:चं ऑफिस, अम्मी अब्बूंना सतत धीर देणं, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी चर्चा करणं, सगळ्या जबाबदाऱ्या तो व्यवस्थितपणे पार पाडत होता. घरातलाच एक सदस्य झाला होता.

अम्मी अब्बू पूर्ण बरे झाले होते. खोलीत राकेश अन् फरहा दोघंच होती. सलमा रडत होती. राकेश तिला समजवत होते. ‘‘प्लीज फरहा रडू नकोस…उद्या तुझं बँडेज काढतील. तू धीराने या गोष्टीला सामोरी जा. मी आहे ना तुझ्याबरोबर, तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करीन मी. ऑफिसातही सगळे तुझी वाट बघताहेत.’’

‘‘पण आता माझ्याशी लग्न कोण करणार? अम्मी अब्बूंना माझ्या लग्नाची काळजी लागलीए.’’ सलमा म्हणाली.

‘‘मी तर कधीचा वाट बघतोय तुझ्याकडून होकाराची. अगं माझ्या आईनेही संमती दिलीए, कुणीशीही कर पण लग्न कर. तुझं बँडेज एकदा निघू दे. मी आईला तुझ्या अम्मीला अब्बूंना भेटायला घेऊन येतो.’’

हळूहळू परिस्थिती निवळत गेली. मोडलेलं नाकाचं हाड व हनुवटीचं हाड शस्त्रक्रियेने पूर्ववत् जुळून आलं. खोल जखमांचे व्रणही हळूहळू जातील, असं डॉक्टर म्हणाले. पण मुख्य म्हणजे फरहा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सावरली होती. राकेशच्या घरच्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं. निकाहची जी तारीख ठरवून फरहा गुडगावहून आली होती त्याच दिवशी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये नोंदणी पद्धतीने राकेश व फरहाचं लग्न झालं. सुरेख रिसेप्शन झालं. दोन्हीकडची फारच कमी माणसं आली पण मित्र, कलीज अशी खूप मंडळी अभिनंदनासाठी आली होती. लग्नांनतर काही दिवसातच राकेशला कंपनीने सिडनीला पाठवलं. फरहाही गेली. तिथे त्यांचं छान बस्तान झालं.

फरहाच्या लग्नानंतर अब्बू अम्मी एकदा आपल्या घरी गेले होते. त्यावेळी लोकांनी त्यांना खूपच टोचून बोलून घेतलं. मोहल्ल्यातल्या वयस्कर माणसांनी भरपूर दम दिला. रात्री तर घरावर दगडफेकही झाली. पोलीस बोलावून त्यांच्या संरक्षणात अम्मी अब्बू स्टेशनवर पोहोचले.

अब्बूंची फोनवर कुणाशी तरी बातचीत सुरू होती. त्यांनी फोन ठेवल्यावर फरहाने विचारलं, ‘‘अब्बू, कुणाशी बोलत होता?’’

‘‘अगं, तुझी फूफी होती. बिचारी मदत मागायला येते माझ्याकडे. मुलं तर नालायक निघाली. कुणी तुरुंगात तर कुणी बेपत्ता आहे. बिच्चारी! उपासमारीने मरायची पाळी आलीय तिच्यावर’’ अब्बा म्हणाले.

‘‘फरहा, त्या रात्री हिनेच हिच्या त्या दिवट्या मुलांकरवी अन् त्यांच्या भाडोत्री गुंडाकरवी आपल्या घरावर दगडफेक केली होती. तिच्या मुलाशी आम्ही तुझं लग्न करून दिलं नाही ना? त्या रागाने तिने सगळ्या गावातल्या लोकांनाही आमच्याविरूद्ध भडकवलं होतं. तू राकेशशी लग्न केलं. एका हिंदू मुलाशी लग्न केलं याचाही खूप अपप्रचार केला होता तिने.’’ अम्मा म्हणाली, मग तिने हसत म्हटलं, ‘‘बर का, ही सलमा यंदा दहावीची परीक्षा देतेय. तिची इच्छा आहे तुझ्यासारखी इंजिनीअर अन् एम.बी.ए करण्याची.’’

फरहाने सलमाकडे बघितलं. सलमा म्हणाली, ‘‘मीच फक्त नाही हं फरहाबाजी, आता तर या शहरातल्या सगळ्याच मुलींना तुमच्यासारखं व्हायचंय.’’

‘‘खरंच?’’

‘‘हो ना, पण सगळ्यांचे अब्बू तुमच्या अब्बूसारखे अन् अम्मी तुमच्या अम्मीसारख्या असायला हव्या ना? मला तर आहे आधार या अम्मी अब्बूंचा,’’ म्हणत सलमाने फरहाला मिठी मारली.

भीष्म प्रतिज्ञा

कथा * शलाका शेर्लैकर

माझा नवरा अपूर्व आणि दोन्ही मुलांना माझी टिंगल करायची चांगली संधी मिळाली होती. तसेही ते तिघं एक होऊन नेहमीच माझी फिरकी घ्यायला बघतात. धाकट्या ऋतिकनं मोबाइल हातात घेतला अन् म्हटलं, ‘‘मम्मा, मी आजीला फोन करून सांगून टाकतो की तू मामाच्या लग्नाला येणार नाहीस. कारण तू भीष्म प्रतिज्ञा केली आहेस की आमच्यासोबत कुठंही जाणार नाहीस.’’

त्याच्या हातून फोन घेत नवरा, म्हणजे अपूर्वनं म्हटलं, ‘‘अरे बाळा, मी असताना तुम्ही आजीशी बोलावं हे मला योग्य वाटत नाही. फोन मलाच करू दे. मी आजीला नीट समजावून सांगतो की तुमची लाडकी लेक लग्नाला येणार नाही. तिनं कुठंही न जाण्याची प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा लग्नाची सगळी तयारी एकट्यानं करायची तयारी ठेवा.’’

माझ्या चढलेल्या पाऱ्यावर आईच्या फोननं थंड पाण्याचं काम केलं होतं. पण या तिघांच्या या अशा वागण्यानं माझा पारा पुन्हा चढायला लागला.

मुळात झालं असं होतं की आम्ही एक आठवडा सिमल्याला जाऊन आलो होतो. मुलांना सुट्या होत्या. अपूर्वनंही रजा घेतली होती. प्रवास छान झाला. सिमल्याचा मुक्कामदेखील सुखद होता. परतीचा प्रवास करून आम्ही तासाभरापूर्वीच आपल्या घरात आलो होतो. घरात शिरताच अपूर्व अन् दोन्ही मुलं टीव्ही अन् एसी सुरू करून सोफ्यावर, खुर्च्यांवर पसरले होते. आल्या आल्या अपूर्वनं हुकूम सोडला, ‘‘बबिता पटकन झकास चहा कर बरं, कधी एकदा घरचा चहा मिळेल असं झालंय.’’

‘‘मम्मा, प्लीज चहाबरोबर गरमागरम कांदाभजीही कर ना, कधीची इच्छा आहे मला. तिथं सिमल्याहून निघताना तो टपरीवाला तळत होता ना, तेव्हापासून नाकात वास घुमतोय माझ्या…’’ गौरवनं, मोठ्या चिरंजीवांनी म्हटलं.

‘‘मम्मा, तू मला प्रॉमिस केलं होतं, घरी पोहोचलो की तू मला मस्त थालीपीठ करून खायला घालशील म्हणून, तू तुझं प्रॉमिस विसरली तर नाहीस ना? धाकटे चिरंजीव ऋतिकनं, हम भी कुछ कम नहीं, हे सिद्ध केलं.’’

मी त्यांचं बोलणं ऐकत होते, पण माझं सगळं लक्ष घरातल्या पसाऱ्यावर होतं.

बाल्कनीत वर्तमान पत्रांचा ढीग साठला होता.

कारण आम्ही पेपरवाल्याला ‘पेपर टाकू नकोस’ हे सांगायलाच विसरलो होतो. ती रद्दी जागेवर ठेवणं गरजेचं होतं. मागच्या अन् पुढच्या बाल्कनीला कुंड्यांमधल्या झाडांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. त्यांना आधी पाणी द्यायला हवं होतं. घरात भरपूर धूळ साठली होती. सखूबाई उद्या सकाळी येणार म्हणजे आत्ता निदान घराचा केर काढायलाच हवा. अंथरूणाच्या (बेडवरच्या) चादरी बदलायच्या, स्वयंपाकाचा ओटा निदान पुसून काढायचा. प्रवासातल्या बॅगा रिकाम्या करायच्या. प्रवासात न धुतलेले कपडे मशीलना घालायचे. धूवून झाले की वाळायला घालायचे.

त्या खेरीज हॉटेलचं जेवण जेवून कंटाळलेल्या नवऱ्याला अन् मुलांनाही चवीचं काहीतरी स्पेशल स्वयंपाक हवाच. नुसत्या खिचडीनं किंवा पिठलंभातानं भागणार नाही.

चार दिवसही घराबाहेर राहून आलं की आल्यावर हा जो कामाचा डोंगर समोर दिसतो ना की जीव घाबरा होतो. असं वाटतं कशाला गेलो आपण बाहेर? नवरा अन् मुलांचं बॅगा घरात आणून आपटल्या की काम संपतच. त्यानंतर त्यांना काही काम नसतं. ते तिघं त्यांच्या कोषात, त्यांच्या विश्वात दंग अन् मी एकटी सर्व कामं करता करता मेटाकुटीला येते.

आपापल्या फर्माइशी सांगून ते तिघं टीव्हीपुढे बसलेले अन् मी स्वयंपाकघरात ओट्याशी विचार करत उभी की कामाला सुरूवात कुठून करू?

त्यांची पोटपूजा झाल्याखेरीज ती शांत होणार नाही अन् तोपर्यंत मलाही काही सुचू देणार नाहीत हे मला माहीत होतं. खरंतर प्रवासातून आल्या आल्या आधी स्वच्छ अंघोळ करायची इच्छा होती, पण तो विचार बाजूला सारून मी फक्त हातपाय, तोंड धुतलं अन् पदर खोचून कांदा चिरायला घेतला. एकीकडे कढईत तेल तापत ठेवलं, दुसरीकडे तव्यावर थालीपीठ लावलं, तिसऱ्या शेगडीवर चहाचं आधण चढवलं. भरभरा कांदा भजी, थालीपीठ, चहा अन् बिस्किटं असा सगळा सरंजाम टेबलावर मांडला. मंडळी त्यावर तुटून पडली. मीही शांतपणे चहा घेतला अन् लगेच कामाला लागले.

सगळ्यात आधी धुवायचे कपडे मशीनला घालावे म्हणजे मशीन कपडे धुवेल तेवढ्यात मला इतर कामं उरकता येतील.

मशीन सुरू करायचं म्हणताना मला पाण्याची टाकी आठवली. ओव्हरहेड टँकमध्ये किती पाणी असेल कुणास ठाऊक, कारण आठ दिवस आम्ही इथं नव्हतो. मी ऋतिकला म्हटलं, ‘‘जरा गच्चीवर जाऊन बघ टाकीत पाणी आहे की नाही तर तो दिवटा तोंडावरून पांघरूण घेऊन झोपला. त्यापूर्वी त्यानं मोठ्या भावाकडे बोट दाखवून त्याला वर पाठव एवढं मात्र सुचवलं.’’

मला भयंकर राग आला. धाकट्याकडे दुर्लक्ष करून मी बाहेर आले तोवर मोठ्याला काही तरी जाणीव झाली. तो पटकन् उठला, ‘‘मम्मा, मी बघून येतो अन् गरज असली तर मोटरही सुरू करतो.’’ त्याच्या बोलण्यानं मला बरं वाटलं. चला, कुणाला तरी दया आली म्हणायची. मी प्रवासातल्या बॅगा, सुटकेस रिकामी करायला लागले.

‘‘मम्मा, टाकी पूर्ण भरलेली आहे…आता कृपा करून एक तासभर तरी मला टीव्हीवरचा माझा अगदी आवडता कार्यक्रम बघू दे. प्लीज डिस्टर्ब करू नकोस.’’ त्यानं वरून आल्यावर मला सांगितलं अन् तो टीव्हीपुढे बसला.

सगळ्या पसाऱ्याचा, कामाचा मला इतका ताण येतोय अन् नवरा आणि मुलं मात्र बिनधास्त आहेत. कुणी तोंडदेखलंही मदत करायला म्हणत नाहीएत. बाहेर कुठं जायचं तर हीच तिघं आघाडीवर असतात. उत्साह नुसता फसफसत असतो. पण जाण्याच्या तयारीतही कुणी मदत करत नाहीत की प्रवासातून परतून आल्यावर आवरायलाही मदत करत नाहीत.

आता मात्र अति झालं हं. मी फार सरळ साधी आहे ना, म्हणून यांचं फावतंय. मी एकटी मरते खपते अन् यांची प्रत्येक गरज, मौज, इच्छा पूर्ण करते. पण यांना माझी अजिबात पर्वा नाहीए. आपलं काही चुकतंय याची एवढीशीही जाणीव नाहीए. यांना त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करून द्यायलाच हवीय. मी मनोमन विचार करत होते. कपडे मशीनमध्ये धुतले जात होते. घराचा केर काढून झाला होता. बेडवरच्या चादरी बदलल्या गेल्या होत्या. रद्दी जागेवर गेली होती. कुंड्यांना पाणी घातल्यामुळे मातीचा सुंदर वास सुटला होता. मी पुन्हा हॉलमध्ये पोहोचले.

‘‘ऐकताय का? मी ही तुमच्यासारखा प्रवास करून आलेय. तुमच्यासारखीच मीही दमलेय. मलाही आराम करावासा वाटतोय. पण मला तो हक्क नाही. कारण घरातली सगळी कामं मीच करायला हवीत हे तुम्ही गृहित धरलयं. म्हणूनच मी आता ठरवलंय की यापुढे मी कधीही तुमच्याबरोबर कुठंही येणार नाही. कार्यक्रम ठरवताना तुम्ही पुढाकार घेता, पण तयारी करताना मात्र अजिबात उत्साह नसतो. तिच तऱ्हा परतून आल्यावरही असते. प्रवासाला जाताना, तिथं गेल्यावर आपण काय कपडे घालायचे आहेत ठरवावं लागतं. कोणते कपडे बरोबर घ्यायचे हे बघावं लागतं. तुम्ही तिघंही ते ठरवत नाही. स्वत:चे कपडे बॅगेत भरण्यासाठी काढून देत नाही. मी माझ्या मनानं कपडे घेतले तर तिथं गेल्यावर, ‘‘मम्मा, हा शर्ट मला आवडत नाही, हाच का आणलास? मम्मा, ही जिन्स लहान झालीय. ही मी घालणार नाही, बबिता अगं, हे कुठले सोंगासारखे कपडे मला घालायला देते आहेस? कमालच करतेस…’’ हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. का नाही तुम्ही आपापले कपडे निवडून, मला ठेवायला देत? आतासुद्धा तुम्ही तिघंही मला कामात मदत करू शकला असता, अजूनही करू शकता, पण तुम्हाला कुणाला ती जाणीवच नाहीए. तुम्हाला सगळ्यांना आराम हवाय…मला नको का विश्रांती.’’

माझ्या भाषणाचा थोडा परिणाम झाला. गौरवनं पटकन् टीव्ही बंद केला. एसी बंद करून पेपर बाजूला टाकून नवरा उठला. धाकट्यानं अंगावरचं फेकून दिलं. तोही येऊन उभा राहिला.

तिघंही आपल्याला काय काम करता येईल याचा अंदाज घेत इथं तिथं बघत असतानाच माझा मोबाइल वाजला. रागात होते म्हणून फोनही उचलायची इच्छा नव्हती. पण माझ्या आईचं नाव दिसलं म्हणून पटकन् फोन घेतला. ‘‘हॅलो बबिता, अगं आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. अगं, अभिषेकचं लग्न ठरलं हं! मुलीकडची मंडळी आता इथंच आहेत. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवतोय. अजून लवकरचीच तारीख बघतोय तारीख नक्की झाली की पुन्हा फोन करते. तुला तयारीला वेळ मिळावा म्हणून घाईनं फोन केलाय. तू लवकर आलीस तर मलाही इथं कामं सुधरतील. एकटीला तर मला घाबरायलाच होतंय.’’ आईनं फोन बंद केला.

माझा फोन स्पीकरवर असल्यानं तिघांनीही आईचं बोलणं ऐकलं होतंच. तरीही मी आनंदाने चित्कारले, ‘‘बरं का, अभिषेकचं लग्न ठरलंय. लग्नाची तारीख लवकरचीच निघतेय. आईनं आपल्याला तयारीला लागा म्हणून सांगितलं.’’

‘‘पण मम्मा,’’ धाकटा अत्यंत निरागसपणे म्हणाला, ‘‘तू जाशील मामाच्या लग्नाला?’’

‘‘म्हणजे काय? मी का जाणार नाही? अन् तुम्हीदेखील याल ना मामाच्या लग्नाला?’’ मी आश्चर्यानं म्हटलं.

‘‘अगं, पण एवढयात तू म्हणाली होतीस की यापुढे तू आमच्याबरोबर, कुठंही, कधीही जाणार नाहीस म्हणून?’’ थोरल्यानं म्हटलं.

अन् मग सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे संवाद झाला. तिघंही माझी चेष्टा करू लागले. मघाच्या माझ्या रागावण्याचा जो परिणाम तिघांवर झाला होता. माझी मदत करायला ते तयार झाले होते, त्यावर आईच्या फोननं पाणी फिरवलं.

माझा मूड चांगला झालाय बघून पुन्हा तिघंही आपापल्या खोलीत गेले अन् मीही आरडाओरडा न करता आपल्या कामाला लागले.

दुसऱ्या दिवसापासून अपूर्वचं आफिस, मुलांच्या शाळा वगैरे रूटीन सुरू झालं. मी माझी कामं सांभाळून अभिषेकच्या लग्नाचं प्लॅलिंग सुरू केलं.

पण अभिषेकच्या लग्नाला जायचं, लग्नासाठी लागणारे आपले कपडे, पोषाख वगैरेची खरेदी, शिंप्याकडच्या फेऱ्या, जाताना बॅगा भरणं, आल्यावर बॅगा उपसणं वगैरे सर्व मनात येताच मला टेन्शन आलं.

अपूर्व अन् दोन्ही मुलांच्या असहकारामुळेच मला हल्ली कुठं जाणं नको वाटायला लागलं होतं. खरंतर नवरा अन् मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात. पण मला अपेक्षित असलेली लहानलहान कामाची मदत मात्र ते करत नाहीत. सगळ्यात मोठी अडचण असते ती त्या तिघांच्या कपड्यांच्या बाबतीत. कुठल्या दिवशी, कोणत्या प्रंसगाला कुणी काय घालायचं हेसुद्धा मलाच ठरवावं लागतं. मुलांना म्हटलं, ‘‘चला, आपण दुकानातून तयार शर्ट, पॅन्ट, जीन्स, ट्राउझर्स विकत आणूयात,’’ तर म्हणणार, ‘‘प्लीज मम्मा, आम्हाला शॉपिंग करायला अजिबात आवडत नाही. तूच जा अन् घेऊन ये.’’

‘‘अरे पण मला तुमची निवड, आवड समजत नाही…’’

‘‘तू व्हॉट्सएॅपवर फोटो पाठव. आम्ही पसंत करतो.’’ हे उत्तर मिळतं.

दुकानातून मेसेज केला, फोटो पाठवले तर त्यावर उत्तरच येत नाही. शेवटी मी माझ्या बुद्धिप्रमाणे खरेदी करून घरी येते, तेव्हा एकाला रंग आवडलेला नसतो, दुसऱ्याला कॉलरचं डिझाइन. मला वैतागलेली बघून म्हणतात, ‘‘जाऊ दे गं! नको टेन्शन घेऊस, आम्ही आहेत तेच कपडे घालू…रिलॅक्स!’’

आता यांना कसं समजावून सांगू की जोपर्यंत नवरा आणि मुलं नवे कपडे घालत नाही, तोवर बायको किंवा आई स्वत:च्या अंगावर नवे कपडे घालूच शकत नाही. मुलांची वागणूक आणि त्यांची चांगली राहणी यावरूनच तर गृहिणीची, आईची ओळख पटते. त्यामुळेच अपूर्व आणि ऋतिक, गौरव यांचे कपडे स्वच्छ, व्यवस्थित आणि प्रसंगानुरूप असावेत म्हणून मी खूप काळजी घेते. मुलं लहान असताना एक बरं होतं. ती ऐकायची.

पण आता ती मोठी झाली आहेत. पूर्वीप्रमाणेच मी शिंप्याकडून शिवून घेतलेले किंवा तयार विकत आणलेले कपडे ती घालंतच नाहीत. त्यांना जे आवडतं, तेच ती घालणार. कित्येकदा मी चिडून म्हणालेसुद्धा, ‘‘तुम्हा दोघांच्या ऐवजी दोघी मुली असत्या तर हौशीनं माझ्याबरोबर खरेदी करायला आल्या असत्या. शिवाय घरकामांतही मला मदत केली असती.’’

मुद्दाम करतात असंही नाही, पण मला गोत्यात आणायची कला बापाला अन् लेकांनाही उपजत असावी. कुठं लग्नाला गेलो असताना नेमक्या प्रसंगी घालायचे कपडे दोन्ही मुलांनी रिजेक्ट केले. एकाची झिप (चेन) खराब झाली होती. दुसऱ्याला झब्बा टाइट होत होता. त्या परक्या ठिकाणी मी कुणी ऑल्टर करून देणारा भेटतोय का किंवा पटकन् झब्बा मिळेल असं दुकान शोधत होते.

यावेळी मी मनातल्या मनात ठरवलं की मी असं काही तरी केलं पाहिजे, ज्यामुळे यांना माझ्या मन:स्थितीची, माझ्या टेन्शनची, माझ्या काळजीची कल्पना येईल. आपण बेजबाबदार वागतो त्याचा हिला त्रास होतो ही जाणीव होईल…अन् मला एक कल्पना सुचली. अंमलात आणायलाही सुरूवात केली.

एकुलत्या एका मामाच्या लग्नाला जायला ऋतिक आणि गौरव उत्सुक असणार अन् एकुलत्या एक धाकट्या मेहुण्याच्या लग्नात ज्येष्ठ जावई म्हणून मिरवायला यांनाही आवडेल हे मी जाणून होते. माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाला जायला मी ही खूपच उत्साहीत असणार हे त्यांनाही माहीत होतं. माझी आयडिया यावरच आधारित होती.

अभिषेकच्या लग्नाला बरोबर एक महिना होता. तेवढ्या वेळातच मला स्वत:ची तयारी करायची होती. शिवाय आईनं सांगितलेल्या अनेक गोष्टी, ज्या इथं मिळतात त्याही खरेदी करायच्या होत्या. वेळ म्हटलं तर कमीच होता. ही तिघं घराबाहेर असायची, तेवढ्या वेळात मी बाजारात जाऊन खरेदी करून घरी यायची. आणलेलं सामान व्यवस्थित कपाटात रचून ठेवायची. बाहेर कधीच कुठल्या पिशव्या नव्या वस्तू कुणाला दिसत नव्हत्या. मी ही घरातच दिसायची. माझ्या मनाजोगती माझी खरेदी अन् तयारी झाल्यामुळे मी खुश होते. पण वरकरणी तो आनंद दिसू न देता मी अगदी नॉर्मल वागत होते. लग्नाचा विषयसुद्धा मी एवढ्या दिवसात काढला नाही.

१५-१७ दिवस असेच निघून गेले. लग्नाचा विषय कुणाच्या डोक्यात नव्हता. मी अगदी शांत आहे हेसुद्धा कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं. मग एक दिवस रात्री जेवायच्या टेबलावर अपूर्वनं विषय काढला. माझी प्रतिक्रिया अत्यंत थंड होती…सगळेच दचकले. तिघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. मी शांतपणे भात कालवत होते. ‘‘बबिता, अगं मी अभिषेकच्या लग्नाबद्दल बोलतोय. तुझ्या डोक्यात शिरतंय का? तू इतकी थंडपणे बसली आहेस? लग्नाची तयारी करायची नाहीए का? तुझी तब्येत बरी आहे ना?’’ अपूर्वनं जरा काळजीनं विचारलं.

‘‘मी बरी आहे की!’’ मी बोलले.

माझा निर्विकार प्रतिक्रिया बघून अपूर्व सावधपणे माझ्याकडे बघत म्हणाले, ‘‘काही प्रॉब्लेम आहे का?’’

माझा बाण बरोबर लक्ष्यावर लागलाय हे बघून मला खूपच आनंद झाला. माझी योजना यशस्वी होतेय तर! मनातून वाटणारं समाधान चेहऱ्यावर न दिसू देता मी निर्विकारपणे म्हटलं, ‘‘मी लग्नाला जात नाहीए.’’

‘‘काय म्हणतेस? काय झालंय…काय,’’ तिघंही उडालेच!

‘‘माझी भीष्मप्रतिज्ञा विसरलास का?’’ मी ऋतिककडे बघत विचारलं.

‘‘अगं मम्मा, अभिषेक मामाचं लग्न होऊन जाऊ दे. मग पुन्हा कर भीष्म प्रतिज्ञा.’’ तो चेष्टेच्या सुरात म्हणाला. खरं तर मला हसायला येत होतं, पण मी गंभीरपणे म्हणाले, ‘‘मी सीरीयसली बोलतेय. उगाच काहीतरी कॉमेडी करू नका,’’ मी पटापट जेवले अन् आपलं ताट सिंकमध्ये ठेवून आपल्या खोलीत निघून गेले.

जाता जाता मी ऐकलं, गौरव अपूर्वला म्हणत होता, ‘‘पप्पा, आई बहुतेक आपल्यावर रागावली आहे. दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.’’

‘‘तुम्ही काळजी करू नका. मी आईचा राग घालावतो.’’ अपूर्वनं मुलांना आश्वस्त केलं.

दुसऱ्या दिवशी दुपारीच अपूर्वनं ऑफिसातून फोन केला, ‘‘बबिता, अगं, आज मी ऑफिसातून लवकर घरी येतोय. आपण अभिषेकच्या लग्नासाठी खरेदी करूयात. माझ्याकडे लग्नात घालण्यासारखे कपडे नाहीएत. काही कपडे मी घेतो विकत. तुझ्यासाठीही काही नवीन साड्या घेऊयात. एकुलत्या एका भावाच्या लग्नात तुला जुन्या साड्या नेसताना बघून बरं वाटेल का?’’

मला त्यांचं बोलणं ऐकून खरं तर हसायला येत होतं. कसंबसं मी स्वत:ला आवरत होते. इतकी वर्ष मी जेव्हा मनधरणी करत होते, तेव्हा माझ्याबरोबर दुकानात यायलाही ते तयार नव्हते अन् मी माझा पवित्रा बदलल्याबरोबर कसे सरळ झाले.

गौरव कॉलेजातून आला अन् म्हणाला, ‘‘ बरं का मम्मा, मी ना, नेटवर सर्व केलंय ऑनलाइन. खूप छान शर्ट आणि ट्राझर्स मिळताहेत…मी विचार करतोय की मी आजच ऑर्डर करतो म्हणजे मला मामाच्या लग्नासाठी बॅग भरता येईल. तुला उगीच दुकानात जा, कपडे निवडा, वगैरे टेन्शन नकोच!’’

मी हसून मान डोलावली. म्हणजे माझा ‘तीर निशाने पे लगा था.’ अपूर्व अन् दोन्ही मुलं आपापल्या कपड्यांचं सिलेक्शन करत होती. प्रथम माझा अन् नंतर एकमेकांचा सल्ला घेत होती, तेव्हा मला खूपच मजा वाटत होती. माझ्या साड्यांची निवड करायला मी अपूर्वलाच सांगितलं.

गौरवनं वर चढून बॅगा काढून दिल्या अन् दोघं पोरं अन् त्यांचा बाप आपापले कपडे बॅगेत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले, तेव्हा मात्र मला राहवेना. मी पुढे होऊन त्यांना थांबवलं. थांबा मी नीट व्यवस्थित भरते बॅगा. बघा फक्त म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही आपल्या आवडीचे प्रसंगाला अनुरूप असे कपडे खरेदी केले हीच तुमची मदत फार मोलाची आहे. मला खूप बरं वाटतंय.

‘‘मम्मा, तू बॅगा जमव. आज बाबांनी डिनरपण ऑर्डर केलाय बाहेरून, म्हणजे स्वयंपाकात तुझा वेळ जायला नको,’’ अपूर्वनं म्हटलं.

‘‘आणि ना, परत आल्यावरही आम्ही तुला घर आवरायला मदत करणार आहोत हं!’’ माझ्या गळ्यात पडून ऋतिकनं म्हटलं.

मला तरी याहून जास्त काय हवं होतं?

मी इथंच बरा आहे

कथा * सुधा गुप्ते

‘‘आयुष्य किती सोपं झालंय. एक बटन दाबा अन् हवं ते मिळवा. ही छोटीशी डबी खरोखर आश्चर्यच आहे. कुठंही कुणाशीही बोला,’ मोनूदादा एकदम खुशीत होता.

कालच १० हजारांचा मोबाइल घेऊन आलाय मोनूदादा. खरंतर त्याची आधीची डबी म्हणजे मोबाइलसुद्धा चांगलाच होता. पण बाजारात नवा ब्रॅन्ड आल्यावर जुनाच ब्रॅन्ड आपण वापरणं म्हणजे स्टॅन्डर्डला शोभत नाही ना? या डबीला तर इंटरनेट आहे म्हणजे सगळं जग आपल्या मुठीतच आलंय ना?

त्या दिवशी किती वेळ वाद चालला होता मोनूदादा अन् बाबांमध्ये. बाबांना आता एवढे पैसे मोबाइलवर खर्च करण्याची इच्छा नव्हती. आईचा खांदा हल्ली फार दुखतोय. तिच्यासाठी चांगलं वॉशिंगमशीन घ्यायची त्यांची इच्छा होती. पण मोनूदादानं असं काही तारांगण घातलं की आईनं, ‘‘दुखू देत खांदा, मी धुवीन कपडे, पण त्याला मोबाइल घेऊन द्या,’’ असं बाबांना सांगितलं. ‘अभावात जगा पण शांतता राखा’ असा आईचा स्वभाव आहे.

‘‘तू मागितला असतास तर नसता दिला पण मोनूला नाही म्हणता आलं नाही. तो आईविना मुलगा आहे. त्याची आई व्हायचंय मला,’’ आई म्हणाली.

मनांत आलं की तिला सांगावं, ‘‘बिना आईचा तर मी आहे. त्याला आई आहे. ज्या दिवसापासून मी अन् आई मोनूदादा अन् बाबांच्याबरोबर राहायला आलो आहोत, त्या दिवसापासून जणू मी अनाथ झालो आहे. वडील आधीच गेलेले अन् आता आईही माझ्या वाट्याला फारच कमी येते. मोनूला आई नाहीए. ती त्याला अन् बाबांना सोडून पळून गेली आहे. त्याची शिक्षा नकळत का होईना मला भोगावी लागते आहे.

माझी आई तर माझीच आहे. माझंच जे आहे ते माझ्यापासून कोण हिसकावून घेणार? पण मला दु:ख हेच आहे की आई माझी असून माझी नाहीए. तिलाही कदाचित असंच वाटत असेल की सावत्र शब्द मधे आला की त्या सावत्रपणाच्या छायेतून बाहेर पडायला फार श्रम घ्यावे लागतात. फार चिकाटी ठेवावी लागते. जो आपला नाही, त्याला आपला करायचाय…जो आपलाच आहे, त्याला, आपलाच आहे हे सिद्ध करायला प्रयत्न करण्याची गरजच काय?

बरेचदा असं होतं. नको असलेल्या नात्यात माणूस अडकतो. माझ्या आजोबांची फार इच्छा होती की त्यांच्या सुनेनं दुसरं लग्न करावं. त्यांच्या एका मित्राचा मुलगा, त्याची बायको घरातून पळून गेल्यामुळे कसंबसं आयुष्य रेटत होता. दोघा मित्रांनी आपापल्या अपूर्ण मुलांना पूर्णत्त्व यावं यासाठी त्यांचं लग्नं करून दिलं. दोघांनाही आपली जबाबदारी पूर्ण झाल्याच्या भावनेनं कृतकृत्य वाटलं, कदाचित माझी आई आणि मोनूचे बाबाही सुखावले असतील.

मी वडिलांना कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे मी कुणालाच बाबा म्हणत नव्हतो. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात आलेले पुरूष काका, मामा, आजोबा किंवा दादाच असायचे. गेली सतरा वर्षं आईच माझी आई अन् बाबा होती. मी माझ्या आजोबांनाच बाबा म्हणत होतो. आईच्या लग्नाची बातमी ऐकल्यावर रात्रभर मी बेचैन होतो. मला झोप लागली नाही. पण आजोबांनीच मला समाजावलं की आईच्या चांगल्या, सुखमय भविष्यकाळासाठी मी तिच्या लग्नाला विरोध करू नये.

‘‘हे बघ बाळा, तू समजूतदार आहेस. आता तू अठरा वर्षांचा आहेस. आणखी  ८-१० वर्षांत तू नोकरीला लागशील. तुझं लग्न, तुझा संसार यात गुंतलास की तुझी आई खूपच एकटी पडेल. तिला कुणाची सोबत, कुणाचा आधार लागेलच ना? इतक्या वर्षांत तिच्या दुसऱ्या लग्नाचा योग आला नव्हता, तो आता आलाय…तर हे लग्न होऊन जाऊ दे…तुला जिथं वाटेल तिथं तू राहा. हे घर तुझंच आहे. तेही घर तुझंच आहे. आम्ही तुझेच आहोत अन् तू आमचा आहेस.’’

वडील नसले की मुलं लवकरच समजूतदार होतात. मीही आईकडे आता वडिलांच्या दृष्टीतून बघू लागलो. कोर्टात दोघांनी सह्या केल्या. एकमेकांना हार घातले अन् दोन अपूरी, अर्धीमुर्धी कुटुंब मिळून एक संपूर्ण कुंटुंब झालं. मी आईला प्रथमच असं नटलेलं बघितलं. कपाळावर कुंकु, गळ्यात मंगळसूत्र, हातात सोन्याच्या, काचेच्या बांगड्या अन् जरीची राणी रंगाची साडी…आई इतकी सुंदर दिसत होती…एक संपूर्ण अनोळखी कुटुंब आईचं होत गेलं अन् मी मात्र आईपासून दूर होत होत बहुतेक घरातून बाहेरच होईन असं वाटतंय.

‘‘काय झालंय तुला? असा गप्प का आहेस विजय?’’ मीरा, माझी क्लासमेट आहे. पण खूपच समजूतदार आहे. माझी समजूत घालण्याचं काम तिचंच असतं.

‘‘आज आईकडे नाही जाणार? आजोबांच्या घरी जातो आहेस का? काही प्रॉब्लेम आहे का?’’

मी काय सांगू? कसं सांगू? माझी आईच माझ्यापासून दूर दूर जाते आहे…म्हणजे मला असुरक्षित वाटतंय असं नाहीए. आईच्या हृदयातला एक कोपरा मी आनंदानं मोनूदादासाठी दिला असता पण तो त्या लायकीचा नाहीए…आई इतकी त्याच्या मागेपुढे फिरते. त्याचं कौतुक करते पण तो मात्र आईचा मान अजिबात ठेवत नाही…उलट अपमानच करतो. हे सगळं मला सहन होत नाही.

माझ्याहून मोठा आहे मोनूदादा, वीस एकवीसचा सहज असेल. त्याला इतकंही कळू नये? आई बिचारी त्याला ‘आपला’ म्हणत असते. सतत त्याच्यासाठी झटत असते. पण त्याच्या मनात काय पूर्वग्रह आहे कुणास ठाऊक…पण जसं त्याच्या वडिलांना माझेही वडील म्हणून मी स्वीकारलं आहे, तसा तो माझ्या आईला त्याची आई म्हणून स्वीकारतच नाहीए…’’

मीरानं माझ्या हातावर थोपटून मला शांत केले. ‘‘वेळ लागतो विजय…आत्तापर्यंत त्या घरात त्याचं एकछत्र साम्राज्य होतं. आता तुम्ही दोन नवीन माणसं त्याच्या अधिकारावर अतिक्रमण करताय…’’

तिला पुरतं बोलू न देता मी म्हटलं, ‘‘अधिकारावर अतिक्रमण कसं म्हणतेस तू? अन् आई एकटीच त्यांच्या घरात गेलीय. मी तर बहुतेक वेळ आजीआजोबांकडेच राहतो. फार क्वचित मी तिथं जातो.’’

‘‘फार क्वचित जातो म्हणजे?’’ मीरानं आश्चर्यानं विचारलं. ‘‘कधीतरीच तिथं जाशील तर त्या घरात रमशील कसा? ते घर तुझं वाटेल कसं तुला?’’

‘‘ते घर मला माझं वाटण्याला काही अर्थ नाहीए…माझ्या बाबांचं, आजोबांचं घर आहे ना माझ्यासाठी. ते माझ्या आईचं घर आहे. तिनं तिथं रूळायला, रमायला हवंय आणि ती रमलीय तिथं. आपला नवा संसार सजवण्यात, ते घर नीट ठेवण्यात, नव्यानं त्याची मांडणी करण्यात ती इतकी गुतंली आहे की आठ आठ दिवस मी तिकडे फिरकत नाही हेही तिच्या लक्षात येत नाही. ‘इतके दिवस आला का नाहीस?’ एवढंही ती मला विचारत नाही. अर्थात आजोबांना अन् मलाही तेच हवं होतं…आईला जोडीदार मिळावा, ती एकटी राहू नये अन् तिनं सुखाचा संसार करावा. तसंच होतंय.’’

‘‘पण या आधी कधी तू बोलला नाहीस? मला तर वाटलं, गेलं वर्षभर तू तुझ्या नव्या घरातच राहतो आहेस.’’

‘‘खरं सांगायचं तर ते घर मला ‘माझं’ वाटत नाही. फारच कमी दिवस मी राहलोय तिथं.’’

‘‘पण तुझं नवे बाबा काही म्हणत नाहीत? तू इथंच थांब म्हणून आग्रह नाही करत?’’

‘‘सुरूवातीला म्हणायचे…मोनूदादाची खोलीही मला दिली होती. मला खोलीचा मोह नाहीए. आजोबांचं अख्खं घर आहे माझ्यासाठी. प्रश्न अधिकाराचाही नाहीए. प्रश्न प्रेम अन् मान राखण्याचा आहे. जागेसाठी मी तिथं राहत नाही. तिथं राहताना मला सतत जाणवतं की मोनू माझ्या आईशी नीट वागत नाही. तिला लागेल असं बोलतो अन् ते मला खटकतं. कदाचित मी आईच्या बाबतीत फार हळवा असेन. मी कदाचित अधिक संकुचित वृत्तीचा असेन. काही गोष्टी पचवणं मला जमत नाहीए. पूर्वी माझी आई फक्त माझी होती, पण आज ती एका अशा पुरुषाबरोबर आनंदात आहे जो माझा पिता नाहीए. मी जर माझ्या आईवरचा अधिकार सोडतोय तर मोनूनं तिचा मान राखायला हवा ना?’’

‘‘त्याचं मन तुझ्याएवढं मोठं नसेल विजय अन् त्याची समजही तुझ्याएवढी परिपक्व नसेल?’’ मीरानं म्हटलं.

‘‘कदाचित त्याला मीरासारखी मैत्रीण भेटली नसेल…’’ मी हसत म्हटलं. मीराही हसली.

पण वरकरणी मी जरी हा विषय संपवला होता तरीही मनातून मी माझ्या आईची काळजी करतच होतो. एखाद्या बापानं आपल्या मुलीची करावी तशी…आईचा पुनर्विवाह तिच्यासाठी काही नवं संकट तर नाही ना उभं करणार?

पण नवे बाबा आईची खूप काळजी घेतात. आईमुळे घराला आलेलं घरपण, उजळलेलं रूप, आईचा कामसूपणा या सगळ्यामुळे ते प्रसन्न दिसतात. त्यांच्या वागण्या बोळण्यातून आईविषयीचा आदर व कृतज्ञता जाणवते.

बस्स, मला फक्त मोनूदादाचं वागणं आवडत नाही. मी आईचा चेहरा वाचू शकतो. तिची सहनशक्ती अफाट आहे. कधीतरी तिचीही सहनशक्ती संपेल त्यानंतर काय होईल? मी तर तिथं राहतच नाही. मुळात आई आणि मोनूदादात माझ्यामुळे दुरावा यायला नकोय मला. आईचं घर, आईचा संसार अभंग राहावा एवढीच माझी इच्छा आहे. आजीआजोबा पण जणू माझ्या पाळतीवर असतात. माझा चेहरा वाचायचा प्रयत्न करतात. मी आईला भेटतो की नाही, कधी भेटलो होतो वगैरे अगदी खोदून खोदून विचारतात. कधी तरी सांगतो मी की भेट झाली नाही, कधी तरी भेटल्याचं सांगतो. कधी खोटं तर कधी खरं. पण मला या सगळ्याचा फार त्रास होतोय. जीव गुदमरतोय माझा.

मीराला माझी मन:स्थिती कळतेय. ‘‘अरे, वार्षिक परीक्षा डोक्यावर आहे. अभ्यासाकडे लक्ष दे. सारखा त्या मोनूचाच विचार करशील तर पास कसा होशील? आई आधीच त्या मोनूच्या वागण्यानं दु:खी आहे, तू आणखी तिच्या दु:खात भर का घालतोस? हे सगळं चालतंच रे, अन् हळूहळू सगळं मार्गीही लागतं. तू अभ्यास पूर्ण कर, नोकरीला लाग त्यामुळेच आईलाही बरं वाटेल ना?’’ मीरानं मला खूपच छान समजावलं.

अन् मीही जोरदार अभ्याला लागलो. मीरानं म्हटलं ते खरच होतं. मी कर्तबगार निघालो तरच मी आईला आधार देईन ना? तिला तेवढंच बरं वाटेल.

आता मी बहुतेक वेळ माझ्या खोलीतच अभ्यास करत बसायचो. आजी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत होती. आजोबा कधी सफरचंद तर कधी पपई कापून आणून द्यायचे. कधी आजी अक्रोड, बदाम त्यांच्या हाती पाठवायची तर कधी खसखसशीचा शिरा. दोघंही माझ्यासाठी खूप श्रम घेत होते.

‘‘तू अभ्यास नीट कर. इतर कोणतीही काळजी करू नकोस. आम्ही दोघं आहोत ना तुझ्यासाठी?’’ आजीआजोबा सांगायचे.

कधीतरी आईशी फोनवर बोलून घेत होतो. ती तिथं रमली आहे हेच मला खूप समाधान होतं. माझ्या विझणाऱ्या दिव्याला तेवढं समाधान तेलासारखं होतं.

परीक्षा एकदाची संपली अन् मला ‘हुश्श’ झालं. पेपर फारच छान गेले होते. शेवटचा पेपर देऊन मी घरी आलो तेव्हा आईबाबा येऊन बसलेले दिसले. मला सुखद आश्चर्य वाटलं. शेवटी आईला माझी आठवण झाली म्हणायची. मी आईकडे बघितलं. तिच्या कपाळावर ढीगभर आठ्या होत्या. बाबांनी मला जवळ घेऊन माझ्या खाद्यांवर थोपटलं.

‘‘आम्ही तुला घ्यायला आलोय बाळा, पेपर छान गेले ना? आता आपल्या घरी चल…’’ बाबा म्हणाले.

‘‘नाही…नाही…मी येणार नाही. ते घर माझं नाहीए…मी इथंच बराय. हेच माझं घर आहे.’’ नकळत मी बोलून गेलो.

‘‘अरे, इतके दिवस तुझ्या परीक्षेचा ताण होता तुझ्यावर, म्हणून आम्ही गप्प होतो. पण आता चल त्या घरी.’’

‘‘नाही बाबा, मला नाही जायचंय…प्लीज माझ्यावर बळजबरी करू नका.’’

‘‘मोनूशी भांडण झालंय का तुझं? तो सांगत होता तू त्याच्या आईचं नाव घेऊन त्याची बदनामी केलीस म्हणून?’’ आई रागानं म्हणाली.

बाबा आईला न बोलण्याबद्दल सांगत होते, पण ती मात्र पूर्ण शक्तिनिशी मला दोषी ठरवत होती.

‘‘तू मोनूच्या आईचं नांव घेऊन त्याला हिणवलंस, टोमणे दिलेस, लाज नाही वाटत असं वागायला? काय बोलावं अन् काय बोलू नये हे कळण्याइतका मोठा झाला आहेस तू. लहान नाहीएस.’’

क्षणभर वाटलं सगळे एका बाजूला झाले आहेत अन् मी एकटा एका बाजूला आहे. मी मोनूला कधी त्याच्या आईबद्दल वाईटसाईट बोलले,  मी तर त्याला टाळतंच असतो. शक्यतो समोरासमोर येत नाही कारण मुळात त्याचं वागणंच बरोबर नसतं.

‘‘तू असं का केलंस बेटा? तू तर समजूतदार आहेस ना राजा?’’ आजीनंही मलाच विचारलं.

आजोबाही न्यायाधिशाच्या भूमिकेत दिसले. इतके दिवस सगळे गप्प होते कारण माझी परीक्षा होती. आज शेवटचा पेपर झाला अन् सगळ्यांचाच संयमाचा बांध फुटला. माझं वर्षभर गप्प राहाणं, संयमानं स्वत:वर बंधनं घालणं सगळं गेलं आलं…माझ्या आईसाठी माझं मन सतत आक्रोशत होतं ते सगळं बेकारच म्हणायचं. मी जणू अपराधी आहे असंच सगळ्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की या आक्रमणासाठी अजिबातच तयारीत नव्हतो. परीक्षा संपल्याच्या आनंदात घरी आलो होतो. कसं छान हलकं हलकं वाटत होतं. घरी अजून एक परीक्षा वाट बघतेय हे कुठं ठाऊक होतं?

मी जरा सावरतोय तेवढ्यात आईनं प्रश्न केला, ‘‘तू मोनूना असं विचारलंस की त्याची आई कुणाबरोबर पळून गेली म्हणून? विचारलं होतंस असं?’’

मी चकितच झालो…कुठली गोष्ट कुठं नेऊन ठेवली अन् कशी लोकांसमोर मांडली मोनूनं? स्वत:चं वागणं नाही सांगितलं…मी काही बोलणार तेवढ्यात बाबांनी माझा हात धरून मला माझ्या खोलीत आणलं अन् खोलीचं दार आतून लावून घेतलं. माझ्यासमोर उभं राहून ते बराच वेळ माझ्या चेहऱ्याकडे बघत होते. मग म्हणाले, ‘‘मला कळतंय, तुझा संयम संपला असेल तेव्हाच तू काहीतरी बोलला असशील…काय घडलंय बाळा? तू तुझ्या आईपासून दूरदूर का राहतोस? माझं घर नांदतं व्हावं अन् तू एकटा पडावास असं मलाही नकोय. तू तिथं का येत नाहीस?’’

‘‘मोनू माझ्या आईला मान देत नाही…वाईट वागतो. ते मला बघवत नाही, सहन होत नाही, म्हणून मी तिथं येत नाही.’’

‘‘काय म्हणतो मोनू? मला सांग तर खरं…तूही माझा मुलगा आहे. तुझाही माझ्यावर तेवढाच अधिकार आहे.’’

‘‘मला कुठलाच अधिकार नकोय बाबा. अधिकाराची एवढी हाव असती तर मी आईला तुमच्याकडे पाठवलंच नसतं. आईच्या आनंदासाठी, आईला मी माझ्यापासून दूर केलंय…या घरात तिला काय कमी होतं? खाणं, पिणं, कपडालत्ता, मानसन्मान सगळंच होतं…आजी आजोबा अन् मीही तिच्यावर जिवापाड प्रेम करतो.’’

मोनू कॉलेज कॅन्टीनमध्ये माझी चेष्टा करतो. मित्रांना सांगतो, ‘‘याची आई माझ्या घरी पळून आली आहे… तो असं का म्हणतो? मला माझ्या आईला सांभाळता येत नव्हतं का? माझी आई तर वडिधाऱ्यांच्या सांगण्यावरून अगदी राजरोसपणे लग्न करून तुमच्या घरात आली आहे. पण मोनूचा आई कुठं भटकते आहे हे त्याला ठाऊक आहे का? माझी आई कुठं आहे हे मला ठाऊक आहे? बाबा तुम्हीच सांगा, मी त्याला हे विचारलं यात माझं काय चुकलं? अपमान त्यानं माझा केलाय की मी त्याचा केलाय?’’

बाबा खरोखर अवाक् झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्वत:च्या मुलाच्या वर्तणुकीची लाज स्पष्ट दिसत होती. ते दुखावलेही गेले होते.

‘‘बाबा, तुम्हालाही वाटतं माझ्या आईनं तुमच्याशी लग्न केलं ही वाईट गोष्ट आहे? त्यामुळे माझा अपमान होणं बरोबर आहे का?’’

‘‘नाही रे बाळा, असं बोलू नकोस, माझं तर आयुष्यच आता कुठं सुरू झालंय…तू अन् तुझी आई माझ्या आयुष्यात आलात …तेव्हापासून…अन्… खरं तर आईची माया काय असते ते मोनूलाही तुझ्या आई घरात आल्यावरच समजलंय.’’

‘‘समजलंय तर तो आईशी कृतज्ञतेनं का वागत नाही? तिचा अपमान का करतो? तिचा मान ठेवत असता तर चार फालतू मित्रांमध्ये बसून माझ्या आईबद्दल असं बोलला नसता. तुमच्या अन् आईच्या लग्नानंतर लगेचच काही दिवसात तो असं बोलला. त्या दिवसापासून मी त्याच्याकडे बघतही नाहीए. मला फक्त इतकंच समजतंय की तो माझ्या आईला मान देत नाही. मी त्याला काहीही म्हणालो नाही. फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी त्याच्या आईचा अपमान का करेन?’’

बाबा गप्प होते. माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. मग मला जवळ घेऊन कुरवाळू लागले. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शानं मला एकदम रडू आलं.

‘‘पण मग इतके दिवस तू हे सगळं माझ्याजवळ बोलला का नाहीस? इतकं सगळं मनात का ठेवलंस?’’

‘‘मला मोनूची मन:स्थिती समजतेय बाबा, त्याला तुमच्यावरचा अधिकार विभागला गेलेला सहन होत नाहीए. पण ज्याच्या आईचा स्वत:चाच पत्ता ठिकाणा नाहीए, त्यानं दुसऱ्याच्या आईबद्दल अपमानकारक का बोलावं?’’

‘‘मोनूनं असं बोलायला नको होतं. मी विचारेन त्याला?’’

‘‘नका विचारू बाबा, आईला कळलं तर मोनूबद्दल तिच्या मनात किल्मिष येईल. मग ती मोनूना माया देऊ शकणार नाही. ती माझी आई आहे. ती माझीच राहील. दूर किंवा जवळ राहण्यानं ती माझ्यापासून दुरावेल असं नाही. पण मोनूला आईची अधिक गरज आहे. म्हणूनच मी आईच्या प्रेमात वाटेकरी होऊन तिथं राहू इच्छित नाही. मला इथंच राहू देत. तिथं राहिल्याने तर नित्य नवं काहीतरी घडेल. तुम्हाला अन् आईला त्याचा त्रास होईल…ते मला नकोय. ते घर मोनूचं आहे, हे घर माझं आहे. मी खरं काय ते तुम्हाला सांगितलं, मी मोनूला चिडवलं नाही, टोमणा दिला नाही फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. माझं बोलणं त्याला झोंबलं, तर त्याच्या बोलण्याचा मला त्रास नसेल झाला?’’

बाबा शांतपणे ऐकत होते. पुन्हा मला कुशीत घेतलं अन् हसून म्हणाले, ‘‘मी खरोखर भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखा शहाणा, समजूतदार मुलगा मिळाला. मला तुझं म्हणणं समजलंय. आता माझंही म्हणणं ऐकून घे. तू अन् तुझी आई, दोघंही माझ्या आयुष्याचा अभिन्न भाग आहात. आधीपासूनच तुम्हा दोघांविषयी माझ्या मनां असलेला आदर अन् कृतज्ञता आता आणखी वाढली आहे, मला वाटतं, आपण चौघांनी एकत्र राहावं.’’

‘‘बाबा, मी काय किंवा मोनू काय, आता लहान नाही आहोत. किती दिवस तुमच्यापाशी राहू? बाहेर जावंच लागेल…मनात तेढ ठेवून जवळ राहण्यापेक्षा दुरून गोडीनं राहावं, भेटताना मोकळ्या मनानं भेटावं हे चांगलं नाही का?’’

बाबांचे डोळे भरून आले. ते मला जवळ घेऊन काही क्षण स्तब्ध उभे होते. मला प्रथमच जाणवलं की मी माझ्या बाबांच्या कुशीत आहे. मला माझे वडिल भेटले.

मला स्वत:पासून दूर करत ते म्हणाले, ‘‘सुखी रहा बाळा, पण स्वत:ला एकटा समजू नकोस, मी तुझाच आहे. जे लागेल ते हक्कानं माग. आज उद्या कधीही…मी तुझाच आहे. मोनूला थोडा वेळ देऊ या. एकेकाला समज उशीरा येते. काळही बरंच काही शिकवतो. त्यालाही हळूहळू नाती कळायला लागतील.’’

आई बाहेरून खोलीचं दार सारखं वाजवत होती. बहुधा ती घाबरली होती…बाबांसाठी किंवा माझ्यासाठी कदाचित दोघांनी आत काय गोंधळ घातला असेल म्हणून. बाबांनी दार उघडलं. आईच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या होत्या. तिच्या एकूण देहबोलीवरून ती माझ्यावर किती रागावली आहे हे मला कळत होतं. ती तिच्या नव्या संसारात रमली आहे हे मला कळलं होतं. मलाही तेच हवं होतं. आई तिच्या घरात आनंदात राहावी. माझं काय? मी जिथं आहे तिथंच बरा आहे.

ते खरंच होतं का?

कथा * गरिमा पाठक

श्रेयानं कपाट आवरायला घेतलं होतं. ड्रॉव्हर स्वच्छ करताना तिला एका डबीत विपुलनं दिलेली खड्याची अंगठी दिसली. तिला विपुलला विसरायचं होतं. त्याची कुठलीही आठवण नको होती. वरवर कितीही प्रयत्न केले तरी मनाच्या तळाशी दडून बसलेली आठवण अशा काही प्रसंगांमुळे उसळून वर यायचीच. ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं, त्यानंच आयुष्यातलं सगळ्यात जास्त दु:ख दिलं.

तिच्या सत्ताविसाव्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीचा दिवस. त्याच दिवशी विपुल अन् नेहा, तिची धाकटी बहीण, दोघांनाही तिनं गमावलं होतं.

ज्या बहिणीसाठी ती नेहमीच ढाल बनून उभी असायची. तिनेच श्रेयाच्या विपुलला तिच्यापासून हिसकावलं होतं. आई गेल्यानंतर तिनं नेहाला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. ती विपुलला नेहमी म्हणायची, ‘‘नेहा माझी बहीण नाही, मुलगी आहे. तिला मी फुलासारखी जपते. तिला मी दु:खी अवस्थेत बघूच शकत नाही,’’ त्याच बहिणीनं श्रेयाला डोंगराएवढं मोठं दु:ख दिलं होतं. त्यातून बाहेर पडताना श्रेयाला किती कष्ट झाले होते.

तिचं मन कडू आठवणींनी विपष्ण झालं. विपुलची आठवण आली की नेहमीच असं व्हायचं.

‘‘श्रेया…,श्रेया…कुठं आहे, तू?’’ ज्ञानेश्वरच्या तिच्या नवऱ्याच्या हाकांनी ती भानावर आली.

श्रेया खोलीबाहेर येताच ज्ञानेश्वरनं म्हटलं, ‘‘आज आपल्याला नमनकडे जायचंय, विसरलीस का?’’

‘‘खरंच की! मी विसरलेच होते…मी आवरते हं लवकरच!’’?श्रेयानं म्हटलं. ती भराभर आवरू लागली. आरशासमोर मेकअप करताना तिनं स्वत:लाच दटावलं, ‘‘इतकी का ती आहारी जातेस जुन्या आठवणींच्या? विपुल गेला सोडून तर जाऊ देत ना? आपणही त्याला विसरायला हवं. असं रडत बसून कसं चालेल? तुला ज्ञानेश्वरसारखा भक्कम आधार मिळाला आहे ना? झालं तर मग!’’

ज्ञानेश्वरबद्दल तिच्या मनात अपार आदर दाटून आला. किती प्रेम करतो तो श्रेयावर. ती त्याच्या आवडीची निळी साडी नेसली. त्यावर शोभणारे दागिने व सुंदरसा अंबाडा घालून ती समोर आली, तेव्हा ज्ञानचे डोळे आनंदानं चमकले. पसंतीचं हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. मुलगा सौरभ, ज्ञान व ती असे तिघं खूपच दिवसांनंतर एकत्र बाहेर पडले होते. सौरभची लाडीक बालसुलभ बडबड ऐकत असताना श्रेयाच्या मनावरचं मळभ सहजच दूर झालं. नमनकडे त्याच्या मुलाचा साखरपुडा होता. खूपच आनंदी अन् उत्साहाचं वातावरण होतं. श्रेया त्या वातावरणात मुक्तपणे वावरली अन् तिनं ज्ञानसोबत डान्सही केला.

तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. वळून बघते तो एक वयस्कर स्त्री होती. श्रेयाच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. ती भयचकित नजरेनं तिच्याकडे बघू लागली.

ती स्त्री विपुलची आई होती. त्यांच्या डोळ्यात पूर्वीप्रमाणेच वासल्य होतं. अचानक त्यांना बघून श्रेयाला काहीच सुधरेना अन् मग एकाएकी त्या स्त्रीला मिठी मारून श्रेया गदगदून रडू लागली. मनातल्या भावना अश्रूवाटे व्यक्त झाल्या.

त्या बाई तिला हळूवारपणे थोपटत होत्या जणू तिची वेदना, व्यथा त्यांना कळत होती. श्रेया प्रथमच अशी व्यक्त झाली होती. खरं तर श्रेयानंच त्यांच्याशी संबंध तोडले होते. त्यांच्याशीच नाही तर विपुलशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्रत्येत आठवणीशी तिनं फारकत घेतली होती. तिला कुठूनही विपुलशी, त्याच्या नावाशी संपर्क नको होता. पण आज विपुलची आठवण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती.

एकाएकी ती भानावर आली. हे काय करतेय ती? का अशी कुणापुढे हतबल होतेय? जुन्या आठवणीत गुंतायचं नाहीए तिला.

ती झटकन् त्यांच्यापासून दूर झाली. समोर ज्ञान उभा होता. ती अश्रू लपवत तिथून निघून वॉशरूममध्ये शिरली. ज्ञान विपुलच्या आईबरोबर बोलत होता.

परतीच्या वाटेवर श्रेया अभावितपणे विपुलचाच विचार करत होती. तिचं मन तडफडत होतं, ज्या विपुलसाठी सगळं जग सोडायला तयार होती, त्यालाच आयुष्यातून वजा करून ती जगत होती. मस्ती करून, पक्वान्नांवर ताव मारून सौरभ झोपला होता. ज्ञान सावधपणे गाडी चालवत होता.

रात्रभर श्रेया प्रयत्न करूनही विपुलच्या आठवणींमधून स्वत:ला मुक्त करू शकली नाही. जुने क्षण, जुने प्रसंग डोळ्यांपुढे उभे राहत होते. हातात हात घालून त्यांनी दोघांनी भविष्याची सोनेरी स्वप्नं रंगवली होती. किती गुजगोष्टी करत बसायची ती दोघं. विपुल शांत, समजूतदार होता.

आजपर्यंत श्रेयाला कळलं नाहीए की त्याची अन् नेहाची इतकी सलगी कधी अन् केव्हा झाली…विपुलनं नेहासाठी श्रेयाला दूर लोटलं. दुधातल्या माशीप्रमाणे आयुष्यातून काढून टाकलं.

श्रेयाचा विपुलवर किती विश्वास होता. तो तिचा विश्वासघात करेल असा स्वप्नांतही विचार केला नव्हता. तिनं आणि तिची लाडकी बहीण नेहा…तीही अशी वागेल याची तरी कुठं कल्पना होती तिला. नेहा कॉलेजच्या फायनल ईयरला होती. तिचं इंग्रजी थोडं कच्चं होतं. श्रेयानंच विपुलला म्हटलं होतं की नेहाला जरा अभ्यासात मदत कर. आपण आपल्याच हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारतोय हे तेव्हा श्रेयाला समजत नव्हतं.

त्या दिवशी कॉलेजमधून थकून भागून आलेली नेहा भयंकर काळजीतही होती. एकाएकी श्रेयाला मिठी मारून ती जोरजोरात रडायला लागली. पाठोपाठ विपलुही घरात आला. श्रेयानं त्याला बसायची खूण केली अन् ती नेहाला थोपटून शांत करू लागली. तेवढ्यात विपुल म्हणाला, ‘‘श्रेया, तुझ्याशी जरा बोलायचं आहे.’’

‘‘बोलूयात आपण, पण आधी जरा नेहाला शांत करू देत…नेहा, काय झालंय? का रडतेस?’’

‘‘मी कारण आहे तिच्या रडण्याचं,’’ विपुलनं सांगितलं.

‘‘म्हणजे?’’

श्रेयाला काहीच कळेना.

‘‘म्हणजे माझ्यामुळेच नेहा रडतेय.’’

‘‘काय बोलतो आहेस, मला काहीच कळत नाहीए.’’ श्रेयाला अजुनही उलगडा होत नव्हता.

‘‘मला ठाऊक आहे श्रेया, तुला समजायला हे कठीण आहे, पण मला समजून घे. माझा अगदी नाईलाज आहे. मी नेहाच्या प्रेमात पडलोय…मला हिच्याशीच लग्न करायचंय. मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही.’’

‘‘काय?’’ श्रेया केवढ्यांदा किंचाळली. ‘‘तू? तू नेहावर प्रेम करतो आहेस? अन् मग मी माझ्यावर प्रेम करत होतास ना? की ती एक फालतू गोष्ट होती? मनोरंजन, वेळ घालवण्यासाठी एक पोरखेळ नाही विपुल, नाही, माझा यावर विश्वास बसत नाहीए.’’

ती वळली. तिनं लगेच नेहाचे खांदे धरून तिला विचारलं, ‘‘नेहा, विपुल काय म्हणतोय? काय आहे हे सगळं? तो खोटं सांगतोय ना? तू खरं खरं सांग…नेहा सांग!!’’

‘‘ताई, अगं, मला ठाऊक नाहीए…माझ्या आयुष्यात काय लिहिलंय ते…मी तुला काय सांगू?’’

‘‘फक्त एवढंच सांग की तू आणि विपुल एकत्र आयुष्य घालवणार आहात का? विपुल म्हणाला ते खरं आहे का?’’

नेहानं मान खाली घातली अन् होकारार्थी हलवली. आता श्रेयाकडे विचारण्यासारखं किंवा ऐकण्यासारखं काहीच नव्हतं. डोक्यावर धाडकन् काही पडावं तसं वाटलं तिला. ती तिथून उठली अन् आपल्या खोलीत जाऊन अश्रूंना वाट करून दिली.

त्यानंतर विपुल कधी श्रेयासमोर आलाच नाही. त्यानं श्रेयाच्या बाबांजावळ नेहाशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा घरात वादळच उठलं. घरात श्रेया अन् विपुलच्या लग्नाची तयारी चालू होती अन् इथं मात्र वेगळंच घडलं होतं. घरात आधी वादळ अन् मग त्या नंतरची शांतता भरून होती.

श्रेयाला तर काय करावं, कसं वागावं समजत नव्हतं. विपुलनं लग्नाला परवानगी देत नाहीत म्हणताना नेहाला घेऊन गावच सोडलं…तो लांब कुठं तरी निघून गेला, कुठं गेला हेही फारच कमी लोकांना ठाऊक होतं.

श्रेयाच्या घरच्यांनी विपुल अन् नेहाशी संबंधच तोडले. विपुलनंही परत कधी विचारपूस केली नाही…श्रेयाची प्रेमकहाणी तिचं आयष्य उद्ध्वस्त करून संपली.

काही दिवस सगळ्यांचेच विचित्र अस्वस्थतेत गेले. हळूहळू पुन्हा आयुष्य पूर्वपदावर आलं. घरच्यांनी स्थळं बघायला सुरूवात केली अन् ज्ञानेश्वर सगळ्यांना पसंत पडला. आयुष्याचा डाव पुन्हा मांडण्यासाठी श्रेयाला स्वत:शीच खूप झगडावं लागलं. तिनं ज्ञानशी लग्न केलं पण मनातून पहिलं प्रेम जात नव्हतं. ती मोकळेपणानं ज्ञानला साथ देऊ शकत नव्हती. ज्ञानही समजूतदार होता. त्यानं श्रेयाला समजून घेतलं. सौरभचा जन्म झाल्यावर श्रेयाला आयुष्यात पुन्हा रस वाटू लागला.

सगळी रात्र जुन्या आठवणींच्या आवर्तात गेली. सकाळी उठली तेव्हा श्रेयाचं डोकं जड झालेलं होतं. कशीबशी कामं आटोपत होती. सौरभ शाळेला अन् ज्ञान ऑफिसात गेल्यावर थोडा वेळ झोपावं असा तिनं विचार केला होता. बारा वाजून गेले होते. आता आडवं व्हावं असा विचार करत असतानाचा दराची घंटी वाजली. थोडं वैतागूनच तिनं दार उघडलं अन् ती चकित झाली.

समोर विपुल उभा होता. दमलेला, थकलेला, त्रासलेला…आजारी दिसत होता. क्षणभर श्रेयाला ओळखता आलं नाही. काळे केस पांढरे झाले होते. तजेलदार रंग फिकटला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं…

श्रेयाला अवघडल्यासारखं झालं, ‘‘तू…इथं? तू माझ्याकडे कशाला आला आहेस विपुल? मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीए.’’

‘‘खरंय श्रेया, पुन्हा नाही मी येणार…फक्त हे पत्र तुला द्यायला आलो होतो.’’ हातातलं पाकिट तिला देत तो बोलला. त्याचे डोळे भरून आले होते. पत्र तिला देऊन तो त्वरेनं निघून गेला.

श्रेया अवाक् होऊन काही वेळ तिथंच उभी होती. ज्या व्यक्तिला क्षणभरही आठवायचं नाही असं तिनं ठरवलेलं असतानाच तिच व्यक्ती तिच्या दारी आली होती. तिच्या नकळत तिच्या मनात इच्छा होती की ज्यानं तिला दुखावलं त्यालाही कधी सुख मिळू नये. पण आज त्याला अशा अवस्थेत, डोळ्यांत अश्रू घेऊन उभा असलेला बघून तिला गलबलून आलं. ती दारातून घरात आली. एक दीड तास काहीच न सुचून वेड्यासारखी या खोलीतून त्या खोलीत फिरत होती. शेवटी धाडस करून तिनं ते पाकीट उघडलं. हात थरथरत होते. बहिणीचं अक्षर बघून तिला त्या पत्राचा मुका घ्यावासा वाटला…पण दुसऱ्याच क्षणी तिरस्कार उफाळून आला. तिनं पत्र वाचायला सुरूवात केली.

‘‘ताई, क्षमा मागायचा हक्क नाहीए मला, तरी क्षमा मागतेय…हे पत्र तुला मिळेल तोपर्यंत कदाचित मी या जगातून गेलेली असेन. इतके दिवस काही गोष्टी आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या. पण आता खरं काय ते सांगते म्हणजे मी मरायला मोकळी.’’

‘‘ताई, माझं विपुलवर किंवा विपुलचं माझ्यावर प्रेम नव्हतं…नाहीए…विपुल फक्त तुझेच आहेत. तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे त्यांचं अन् म्हणूनच तुझ्या लाडक्या बहिणीचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी आपली आहुती दिली…माझ्याशी लग्न केलं. ताई कुणा एका नराधमानं मला नासवलं. त्या प्रकारामुळे मी फार कोलमडले होते. तरीही मी त्याला लग्नाची गळ घालणार होते, पण त्यापूर्वीच एका अपघातात तो मरण पावला. मी सुटकेचा नि:श्वास सोडला, पण माझ्या पोटात त्याचा गर्भ वाढत होता…मी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांनी मला तपासलं अन् सांगितलं की आता गर्भपात जिवावरचा ठरेल.

‘‘मी वेड्यासारखी रडत होते…काय करू सुचत नव्हतं. नेमके त्याचवेळी कुणा नातलगाला घेऊन विपुल डॉक्टराकंडे आले होते. त्या क्षणी ते भेटले नसते तर मी विष खाऊन जीव देणार होते. तसं ठरवलंच होतं, पण विपुलनं तुझी शपथ घालून खरं काय ते माझ्याकडून काढून घेतलं. मी खूप घाबरले होते. बाबांच्या इभ्रतीची काळजी होती. ते हार्ट पेशंट होते. त्यांना हार्ट अॅटक येऊ शकला असता. मी स्वत:ला क्षमा करू शकत नव्हते.

‘‘पण विपुलनं धीर दिला. यातून मार्ग काढू म्हणाले म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. माझ्या मुलाला त्यांचं नाव दिलं. इतक्या लांब बदली करून घेतली…माझ्या प्रेगनन्सीबद्दल कुणालाच काही कळू दिलं नाही.

मी विचार केला होता की सगळं व्यवस्थित पार पडलं की मी पुन्हा तुझ्याकडे येईन. खरं काय ते सांगेन. पण विपुलनं मला अडवलं. तुझं लग्न होईपर्यंत आम्ही थांबायला हवं. तुझ्या लग्नाबद्दल कळलं होतं. पण माझ्या येण्याचा अपशकुन नको म्हणून नाही आले…तुझ्यासमोर येण्याचं धाडसही नव्हतं.

‘‘ताई मला क्षमा कर. आयुष्य संपत आलंय माझं. एक गोष्ट अगदी खरी की माझी काळजी घेतली विपुलनं, माझ्या मुलाला स्वत:चं नाव दिलं, पण त्यांनी मला कधी स्पर्शही केला नाही. मलाही फक्त त्यांचा आधार मिळाला. ते तुझेच आहेत…जमल्यास माझ्या मागे त्यांची काळजी घे.’’

– तुझीच अभागी बहीण नेहा.

पत्र वाचता वाचता श्रेयाला रडू अनावार झालं. किती भोगलं बिचारीनं…अन् विपुल केवढा महान, किती त्याग केला त्यानं प्रेयसीच्या बहिणीसाठी…तिला भेटायला हवं…कुठं…कसं? विपुल तर केव्हाचाच निघून गेला होता.

अंथरूणावर पडून रडता रडता थकून तिला कधीतरी झोप लागली. पत्रं हातात तसंच होतं. तिला जाग आली तेव्हा ज्ञान ऑफिसातून परतला होता. चहा करून घेत होता. ती धडपडून उठली. तेवढ्यात चहाचे कप घेऊन ज्ञानच खोलीच आला.

‘‘चहा घे…आपल्याला जरा बाहेर जायचं आहे,’’ तो गंभीरपणे म्हणाला.

‘‘सॉरी, मी नाही येऊ शकत…’’ ती थकलेल्या आवाजात म्हणाली.

‘‘श्रेया, नाही म्हणू नकोस. तुला यावंच लागेल.’’ ज्ञानच्या आवाजात जरब होती.

जायची तर अजिबात इच्छा नव्हती. कुठं जायचं तेही ठाऊक नव्हतं. पण न जाण्याचं कारण तरी काय सांगणार होती ती? मुकाटयानं आवरून गाडीत जाऊन बसली. ज्ञान न बोलता गाडी चालवत होता. एका मोठ्या हॉस्पिटलसमोर गाडी थांबवून ज्ञाननं म्हटलं, ‘‘श्रेया, तुझ्या बहिणीला भेटून ये.’’ त्याच्या आवाजात आता जरब नव्हती, कोवळीक होती.

‘‘काय म्हणताय तुम्ही?’’ दचकून श्रेयानं म्हटलं अन् तिला एकदम रडूच फुटलं.

तिला थोपटून शांत करत तो म्हणाला, ‘‘ही वेळ बोलत बसण्याची नाही. ताबडतोब नेहाला भेट.’’ त्यानं तिला आधार देऊन गाडीतून उतरवलं.

दोघंही जवळजवळ धावतच आत गेले. वॉर्डमधल्या बेडवर नेहा अखेरचे क्षण मोजत होती. खरं तर ज्या अपराधीपणाच्या भावनेनं तिचं आयुष्य व्यापलं होतं…त्यानंच कॅन्सरच्या दुखण्याला जन्म दिला होता.

श्रेयाला बोलवत नव्हतं, पण तिचा स्पर्श होताच नेहानं डोळे उघडले…श्रेयाला बघताच तिने टाहो फोडला.

‘‘ताई, मला क्षमा कर…मी तुझी अपराधी आहे.’’

‘‘नको गं असं बोलू..दोष तुझा नव्हता, तुझ्या नशिबाचा होता. स्वत:ला दोषी मानू नकोस.’’

‘‘मी आता वाचणार नाही ताई, तुला भेटायलाच जीव अडकला होता. फक्त विपुलना क्षमा कर.’’ तिनं शेजारी उभ्या असलेल्या विपुलचा हात श्रेयाच्या हातात दिला. विपुलच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. दाटलेल्या कंठानं श्रेयानं म्हटलं, ‘‘नेहा, विपुलची तर काही चूकच नाहीए. त्यानं तर स्वत:ची आहुती दिली आहे. मी कोण त्याला क्षमा करणार?’’

नेहाच्या चेहऱ्यावर संतोष झळकला. बराच वेळ श्रेया नेहाचा हात हातात घेऊन बसली होती.

डॉक्टरांनी उपचार संपल्याचं सांगून टाकलं होतं. काही तास फार तर नेहानं काढले असते. ज्ञानेश्वनंही नेहाच्या माथ्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला. विपुलशी हस्तांदोलन करून त्यानं श्रेयाला निघायची खूण केली.

किती वर्ष मध्ये गेली. लाडकी धाकटी बहीण शेवटी का होईना भेटली. मनातलं किल्मिष नाहीसं झालं. विपुलचा मोठेपणा प्रत्ययाला आला…आता मनात राग, चीड, तिरस्कार काहीही नव्हतं. फक्त प्रेम अन् प्रेमच होतं.

पण त्याच क्षणी तिला ज्ञानेश्वरचा मोठेपणाही आठवला.

‘‘ज्ञान, तुम्हाला कसं समजलं, नेहा इथं आहे?’’

‘‘अगं, तू रडता रडता झोपली होतीस, मी घरात आलो तेव्हा पत्र तुझ्या हातात होतं. मी ते वाचलं…मलाही फार वाईट वाटलं…तुझी व नेहाची भेट तर व्हायलाच हवी…मला एकदम विपुलची आई आठवली. नमनकडच्या पार्टीत त्या भेटल्या होत्या…मी त्यांचा मोबाइल नंबर घेऊन ठेवला होता. मी त्यांना फोन केला…त्यांच्याचकडून हॉस्पिटलचा पत्ता मिळाला.’’

श्रेयाच्या मनात ज्ञानबद्दल अपार आदर आणि कृतज्ञता दाटून आली. त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं म्हटलं, ‘‘तुमचे उपकार कसे फिटतील…किती चांगले आहात तुम्ही…’’

‘‘माझे नाही, विपुलचे उपकार मानले पाहिजेत नेहा, त्यानं खरोखर फार मोठा त्याग केलाय. त्याला सांभाळणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्याला एकटा पडू द्यायचं नाही. आपल्या घराशेजारीच एखादं घर घेता आलं तर आई, विपुल अन् नेहाचा मुलगा आपल्या सोबतीनं राहू शकतील.’’

‘‘ज्ञान, किती मोठं मन आहे तुमचं…माझं भाग्य म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात…माझं अन् विपुलचं नातं जेवढं मला समजलं नव्हतं, तेवढं तुम्ही समजून घेतलंत…माझी मन:स्थिती जाणून घेऊन नेहाशी माझी भेट घडवून आणलीत. नेहाच्या मृत्युनंतर विपुल किती एकटा पडेल हेही तुम्हालाच समजलं. खरोखर तुम्ही थोर आहात. मीच तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले…मला क्षमा करा.’’ श्रेया भरल्या गळ्यानं म्हणाली.

ज्ञाननं हसून तिला आश्वस्त केलं. सगळीच नाती आता स्पष्ट झाली होती.

धुके निवळले, उन्हे पसरली

कथा * राकेश भराडे

आयुषीनं उदासपणे आपल्या बेडरूमवरून नजर फिरवली. कपाटं, ड्रेसिंग टेबल, डबलबेड, इथं तिथं पसरलेले कपडे…सगळ्यांवरच एक उदास सावट पसरलं होतं. तिच्या मनाप्रमाणेच या निर्जीव वस्तूही दु:खानं झाकोळून रडत होत्या.

खोलीत शांतता पसरली होती. तिला या शांततेची भीती वाटली नाही, पण एक तऱ्हेची निराशा दाटून आली. जितका अधिक विचार ती करत होती, तेवढीच निराशा अधिक गडद होत होती.

केवळ बेडरूमच नाही तर संपूर्ण फ्लॅट तिनं खूप मनापासून, खपून सजवला होता. स्वत:साठी अन् प्रियकरासाठीही. त्यावेळी डोळ्यात सप्तरंगी स्वप्नं होती. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठीच तिनं हे धाडसी पाऊल उचललं होतं. लग्न न करताही ती प्रतीकबरोबर रहायला तयार झाली होती.

आज मात्र तो उत्साह पार मावळला होता. असं का झालं हे तिला कळत नव्हतं. तिनं तर पूर्ण निष्ठेनं समर्पण केलं होतं. आत्यंतिक विश्वासानं आपला देह, आपलं मन त्याला दिलं होतं. पण त्याचं प्रेम मात्र खोटं होतं. तो प्रेमाचा केवळ देखावा होता. त्याला तिचं तारूण्य हवं होतं. त्यासाठीच त्यानं तिला अगदी बेमालूमपणे आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तिच्या देहाचा पुरेपूर उपभोग घेतलाच शिवाय तिचाच पैसा वापरून चैनही केली. आता हे तिला कळतंय, पण आता उपयोग काय?

एमबीएचा अभ्यास दोघांनी एकाच कॉलेजात केलेला. यादरम्यान त्यांच्यात ओळख, मैत्री अन् प्रेम निर्माण झालं. एक दिवस प्रतीकनं तिला विचारलं,

‘‘आयुषी, माझ्याबरोबर बाहेर येतेस?’’

‘‘कुठं?’’

‘‘तू म्हणशील तिथं…’’

‘‘तुझी स्वत:ची काहीच इच्छा नाही?’’

‘‘आहे ना. पण तुझ्या सहमतीनंच मी सगळं करणार?’’

‘‘चल तर मग…’’ ती पटकन् उठली.

त्यानंतर ती प्रतीकच्या बोलण्यावागण्यावर इतकी भाळली की त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होती.

नोकरी मिळताच एकत्र रहायचं त्यांनी ठरवलं होतं. एकमेकांवाचून जगणं त्यांना अशक्य वाटत होतं. प्रयत्न करून दोघांनी एकाच कंपनीत नोकरी मिळवली. अन् मागचा पुढचा विचार न करता ती दोघं एकत्र रहायला लागली. दोघांचेही आईवडिल त्यांच्या गावी, या शहरापासून बरेच दूर असायचे. पण आपला असा स्वतंत्र संसार थाटून ती दोघं खूपच आनंदात होती.

जेव्हा दोघं एकत्र रहायला लागली, तेव्हा प्रतीकनं सांगितलं, ‘‘हे बघ आयुषी, आपण दोघं एकत्र राहतो आहेत. पण, तू लक्षात घे, पुढे आपल्याला याचा काही त्रास व्हायला नको.’’

‘‘कसला त्रास?’’ तिनं जरा दचकून विचारलं.

‘‘हे बघ, तुला कळतंय…आपण जर एक अॅफिडेव्हिट बनवून घेतलं तर दोघांच्याही दृष्टीनं ते फायद्याचं ठरेल.’’

‘‘अॅफिडेव्हिट कसलं?’’ तिला काहीच कळेना.

‘‘म्हणजे असं की तू मला लग्न करायला बाध्य करणार नाहीए, आई व्हायची तुझी इच्छा मी पूर्ण करणार नाही.’’

आयुषीला कळेना…तिला काळजीही वाटली. लग्न एकवेळ नाही केलं तरी मूल का नको? नवराबायकोसारखे संबंध आहेत म्हटल्यावर मूल हवंय ना? केवळ देहसुखावर सगळं आयुष्य थोडीच जातं? प्रतीक पुरुष आहे, त्याला मूल नको असेल, पण आयुषी तर स्त्री आहे. तिला मूल हवंच हवं. ती मुलाशिवाय कशी जगेल?

प्रतीक तिला समजावत म्हणाला, ‘‘असं बघ आपण अजून मुलाची जबाबदारी पेलण्याच्या परिस्थितीत नाही आहोत. अॅफिडेव्हिट करून घेण्यात आपला दोघांचाही फायदा आहे. तुझ्याही बघण्यात अशा घटना आहेत ना की एकत्र राहिल्यानंतर काही दिवसांनी मुली लग्न करण्यासाठी मुलांवर दबाव आणतात अन् जर मुलांनी ते मान्य केलं नाही तर आपल्या नातलगांकडून, आईवडिलांकडून लग्नासाठी दबाव आणतात अन् नाहीतर सरळ मुलावर बलात्काराची केस ठोकतात.’’

मनातल्या मनात काही तरी खळबळ, फुटल्यासारखं वाटलं आयुषीला. हा इतकी सावधगिरी का म्हणून बाळगतोय?

ती जरा रागावून, परखडपणे म्हणाली, ‘‘प्रतीक, प्रेम नेहमीच विश्वासाच्या पायावर उभं असतं. जर आपला दोघांचा एकमेकांवर विश्वासच नसेल तर आपण एकमेकांवर प्रेम करत नाही असाच अर्थ निघतो. अॅफिडेव्हिटनं आपल्यात प्रेम निर्माण होणार नाही, त्यामुळे दुरावाच वाढेल. मला अॅफिडेव्हिट नकोय. म्हणत असलास तर आपण हे संबंध या क्षणीच संपवूयात.’’

‘‘छे छे असं भलतंच काय बोलतेस?’’ तिला आपल्या बाहुपाशात घेत लगेच प्रतीक म्हणाला. त्याला बहुधा भीती वाटली की अशानं आयुषी हातातून निघून जाईल. हसून तो म्हणाला, ‘‘हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास आहे तेव्हा तूही माझ्यावर विश्वास ठेव. पण बघ, नंतर काही गडबड व्हायला नको.’’

आयुषीच्या मनात एक अढी बसली, पण त्यांचं प्रेम नवं नवं होतं, तिनंही ते फारसं मनावर घेतलं नाही.

भाड्याचा फ्लॅट घेताना सिक्युरिटी डिपॉझिट अन् अॅडव्हान्स आयुषीनंच भरला होता. त्यावेळी प्रतीक म्हणाला होता, ‘‘आयुषी, मला दर महिन्याला घरी पैसे पाठवावे लागतात. सध्या माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत. सध्या ही सर्व रक्कम तू भर. मी नंतर तुला देईन सगळे पैसे.’’

आयुषीला हेही थोडं खटकलंच पण प्रेमाची भरती जबरदस्त होती. विवेकाच्या विचारांना एका लाटेतच तिनं धुवून नेलं. पुढे तर त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत हेही ती विसरली.

आयुषीनं घरात स्वयंपाकाची सर्व भांडी व इतर सामान खरेदी केलं. प्रतीकचा याला विरोध होता. घरी लादी पुसणं, साफसफाई व स्वयंपाकासाठी बाई लावली होती. पण घरी स्वयंपाक क्वचितच व्हायचा. प्रतीकच्या म्हणण्यावरून हॉटेलातूनच जेवण मागवलं जाई. दोघं बाहेर फिरायला वगैरे गेली म्हणजेही हॉटेलातच जेवण व्हायचं. हा सर्व खर्च एकटी आयुषी करायची.

सप्तरंगी स्वप्नांत गुरफटलेले काही दिवस मजेत गेले. चारी बाजूला प्रेमच प्रेम होतं. जग इतकं सुंदर आहे हे आयुषीला प्रतीकच्या प्रेमात पडल्यावरच समजलं होतं. पण हळूहळू प्रेमाचे रंग फिकट व्हायला लागला. घरात खर्च करताना प्रतीक कायम हात आखडता घेत असे. घरातली अगदी साधीशी वस्तूही त्यानं स्वत:च्या पैशानं विकत घेतली नव्हती. त्याला काही हवं असलं की म्हणायचा, ‘‘डार्लिंग, चल नं, काही खरेदी करूयात.’’

‘‘मला नको सांगूस, तुझं तुला काय हवं ते आण.’’ ती म्हणायची.

‘‘पण तुला ठाऊक आहे डियर, माझ्याकडे पैसे नाहीत. मी घरी पाठवून दिलेत ना?’’ अन् मग तो तिला मिठीत घ्यायचा, त्याच्या उष्ण श्वासांनी ती रोमांचित व्हायची अन् त्याच्या मिठीत विरघळायची. मग त्याच्या छातीवर हलकेच गुद्दा मारून म्हणायची, ‘‘बरं, चल.’’

प्रतीक तिला प्रेमाच्या गोष्टी करून असा काही भुलवायचा की तिच्या विवेकाचे, विचारांचे सर्व दरवाजे बंद व्हायचे. तिला कळत नसे की प्रतीक स्वत:चे पैसे खर्च करायला नकार का देतो? तो तिच्या देहाचा तर वापर करतोच आहे शिवाय तिचाच सर्व पगारही उडवतोय. जेवण खाण, कपडा लत्ता, बाजार, वाण सामान, घरभाडं, वीजबिल सगळाच खर्च आयुषी करत असते. प्रतीकची काहीच जबाबदारी नाहीए का?

एवढ्या दिवसात प्रतीकनं घरात तर काय पण स्वत:वर किंवा आयुषीवरही एक पैसा कधी खर्च केला नव्हता. सगळं घर तिनं छान छान वस्तूंनी सजवलं होतं. पडद्यांपासून चादरीपर्यंत, डेकोरेशन पीसेसपासून घरातल्या लॅम्पशेड व बल्बपर्यंतच्या एकेक पैशाचा खर्च आयुषीनं केलेला होता.

आयुषीला कधीतरी स्वत:साठी एखादा ड्रेस घ्यावासा वाटे. ‘‘प्रतीक, हा ड्रेस छान आहे ना? घेऊयात?’’ तो म्हणायचा, ‘‘पैसे असतील तुझ्याजवळ तर घे. ड्रेस खरंच छान आहे.’’

आयुषीच्या लक्षात आलं की तिच्या बँक अकाउंटला महिन्याच्या शेवटी काहीही उरत नाही. तिला मिळणारा सर्व पगार घरातच संपतोय. ती एकटी असताना बऱ्यापैकी शिल्लक ती टाकत होती. पण प्रतीकबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना मात्र ती कंगाल झाली होती. प्रतीकनंच आग्रह करून तिला चार चाकी गाडी घ्यायला लावली होती. ते हप्तेही आयुषीच भरत होती, पण गाडी सतत प्रतीक वापरायचा. पेट्रोल आयुषी भरायची.

आता मात्र आयुषीवरचं प्रेमाचं भूत उतरायला लागलं होतं. एक दिवस जरा रागातच तिनं म्हटलं, ‘‘प्रतीक, घरातले सगळे खर्च मी एकटी करतेय. तुझा एकही पैसा खर्च करत नाहीस तू. या सगळ्या पैशांचं करतोस काय? घराची जबाबदारी तुझीही आहेच ना?’’

‘‘हे माझं तुझं कुठून काढलंस? माझे पैसे मी वाचवतोय ते आपल्याला पुढे उपयोगी पडावेत म्हणूनच ना?’’ तो ही आढ्यतेनं बोलला. मात्र बोलत असताना त्यानं तिची नजर टाळली होती.

आयुषीला हे आवडलं नाही. ‘‘प्रतीक नीट माझ्याकडे बघून उत्तर दे. तुझा पैसा उपयोगी पडेल असा दिवस कधी उगवणार आहे? तू सगळे पैसे घेऊन पळून गेल्यावर?’’

इतकं कडू सत्य? आयुषीला स्वत:लाही नवल वाटलं. इतकं ती कसं काय बोलली? कदाचित परिस्थिती तसं बोलायला भाग पाडते.

आयुषी अजूनही बोलत होती. ‘‘मला तुझी लक्षणं तर अशीच दिसताहेत. तुझ्या दृष्टीनं हा फक्त खेळ आहे. प्रेमाचं नाटक करून माझं शरीर उपभोगतोस. माझ्या पैशावर चैन करतोस. जेव्हा तुझ्या लक्षात येईल की माझे पैसैही संपले आहेत अन् देहातलं आकर्षणही संपलेय, तू एखाद्या गिधाडासारखा दुसरं भक्ष्य शोधशील अन् मी भणंग भिकाऱ्यासारखी भीक मागेन.’’

प्रतीक गप्प बसला होता. जणू आयुषीनं त्याच्या थोबाडीत मारली होती. आयुषीला काहीही म्हणायचं धाडस त्याक्षणी तरी त्याच्यात नव्हतं.

आयुषीला जाणवत होतं की प्रतीकचा तिच्यातला इंटरेस्ट संपला होता. तो तिला कधीही सोडून जाईल. मग ती अगदीच एकटी पडेल. पण ती स्वत:ला बजावून सांगायची. हे जे धाडसी पाऊल तिनं उचललं आहे ते तिनं स्वत:च्या मर्जीनं उचललं आहे. आता त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याची जबाबदारीही तिचीच असेल. त्यासाठी तिनं पूर्णपणे सक्षम असायलाच हवं. प्रतीक जर तिला सोडून गेला तरी ती रडणार, भेकणार नाही. गेला तर गेला. तिचं आयुष्य तिनं जगायचं.

अशात तिला आपल्या आईबाबांची फार फार आठवण येत असे. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. त्यांना तिच्याविषयी किती अभिमान होता. तिच्याकडून ती खूप काही करेल अशा अपेक्षाही होत्या, पण तिनं खरं तर त्यांचा विश्वासघात केला होता.

छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्याच वाद व्हायचे. आयुषी दुखावली जायची. पुन्हा तडफेनं उभी रहायची. प्रतीकच्या वागण्यात सुधारणा नव्हती. त्यानं मनात आणलं असतं तर त्यांचे संबंध पुन्हा पूर्ववत: होऊ शकले असते.

आता घरातली कोणतीही वस्तू ती आणणार नाही असं आयुषीनं ठरवलं होतं. प्रतीकचं शेविंग क्रीम संपलं होतं. डिओ खलास झाला होता. बाथरूममध्ये अंगाचा, कपडे धुण्याचा साबण नव्हता. पण आयुषीनं तिकडे साफ दुर्लक्ष केलं. घरात खाण्यापिण्याचे जिन्नस मात्र ती आणत होती.

प्रतीक एक दिवस भडकून बोलला, ‘‘हे काय घर आहे की धर्मशाळा? साबण नाही, शेविंग क्रीम संपलंय.’’

‘‘तू आण ना? तुझ्या गरजेच्या गाष्टी आहेत. तू वापरतोस. तू विकत आण. तूही कमवतो आहेस ना?’’

‘‘असं कसं बोलतेस तू?’’नरमाईनं प्रतीकनं म्हटलं.

‘‘खरं तेच बोलतेय. खरं तर लग्न केल्यावर बायकोचा खर्च नवऱ्यानं करायचा असतो. लग्न केलं नाही म्हणून इथं उलटंच चाललंय. शारीरिक, भावनिक अन् आर्थिकदृष्ट्या तू माझं शोषण करतो आहेस. एकत्र राहून पैसे मीच खर्च करतेय.’’

‘‘तू अशी का वागते आहेस?’’ प्रतीकनं नाटकीपणे उसासा टाकला.

खरंतर प्रतीक अन् आयुषीला पगार सारखाच मिळत होता. पण आयुषीचा सगळा पगार संपत होता. प्रतीकच्या पगाराचं काय व्हायचं ते तोच जाणो. ती तर त्याच्या प्रेमात अशी काही वेडीखुळी झाली होती की तो कुठला राहणारा, त्याच्या घरात कोण, वडील काय करतात काही काही तिनं विचारलं नव्हतं. उलट स्वत:बद्दल मात्र ती सगळं सगळं सांगून मोकळी झाली होती.

त्यांच्यातली भांडणं वाढलीच होती. त्या काळात एकदा आयुषीनं विचारलं, ‘‘प्रतीक, तू तुझ्या घरच्या लोकांबद्दल, तुझ्या कुटुंबातल्या माणसांबद्दल काहीच बोलला नाहीस? तुमचं गाव कोणतं? तुझे बाबा काय करतात? तुला बहीण-भाऊ किती…वगैरे.’’

विचित्र नजरेनं तिच्याकडे बघत प्रतीक म्हणाला, ‘‘का बरं? एकाएकी याची गरज का भासली?’’

‘‘अरे कमाल करतोस. आपण दोघं एकत्र राहतोय तर एकमेकांविषयी कळायला नको का?’’ आयुषी सहजपणे बोलली.

‘‘हे सगळं तू आधीच जाणून घ्यायसा हवं होतं. आता काय माझ्या घरातल्यांच्या विरूद्ध पोलिसात तक्रार द्यायचीय की माझ्या विषयीच्या कागाळ्या घरातल्या लोकांना सांगायच्या आहेत?’’ प्रतीकनं विचारलं.

आयुषीला त्या क्षणी लख्खपणे जाणवलं की प्रतीकचं प्रेम तिच्या प्रेमासारखं खरं नव्हतं. प्रेमात तर दोषही माफ असतात. तिनं त्याचे सारे दोष स्वीकारलेच होते. पण तो मात्र तिचा पैसा, तिचं सौंदर्य अन् तारूण्य यावर डोळा ठेवून होता.

ती कडवटपणे म्हणाली, ‘‘पोलिसात जायला घरचे नकोत, तूच पुरेसा आहे. मला आता तुझं खरं रूप कळलं आहे…मला आधीच हे कळायला हवं होतं.’’

‘‘आधी कळलं असतं तर काय केलं असतंस?’’ त्यानं भडकून विचारलं.

‘‘मी तर आताही काहीच करणार नाहीए. पण मला वाटतंय की तुला आता आपले संबंध पुढे चालू ठेवायचे नाहीत. विनाकारण भांडतोस, चिडतोस. मी तुला आपल्या नात्यातून मोकळा करते.’’

‘‘मला त्यासाठी तुझ्या उपकाराची किंवा परवानगीची गरज नाहीए. मला हवं ते मी करेन.’’

आयुषीच्या मनात आलं लिव्ह इन रिलेशनशिपचा जास्त फायदा पुरूषांनाच मिळतो. मुली मूर्ख असतात. प्रेमानं वेड्याखुळ्या होतात. मुलांच्या गोड गोड बोलण्यावर भाळतात. त्यांच्यावर खरं खरं प्रेम करतात. मुलांचा खोटेपणा त्यांच्या लक्षातच येत नाही अन् त्याची शिक्षा मुली पुढे आयुष्यभर भोगतात.

शिवांगी आयुषची ऑफिसमधली खास मैत्रीण होती. तिच्या लक्षात आलं आयुषीचं उदास असणं, काळजीत असणं, काहीतरी गडबड आहे हे तिनं जाणलं. एकदा लंचटाइममध्ये तिनं आयुषीला विचारलंच, ‘‘तू अशी का दिसतेस? तुझं अन् प्रतीकचं बिनसलं आहे का?’’

शिवांगीनं आधीच आयुषीला या लिव्ह इनबद्दल सावध केलं होतं. ‘शक्य तेवढ्या लवकर लग्न कर’ असाही सल्ला दिला होता. पण त्यावेळी आयुषी प्रतीकच्या प्रेमात इतकी अंतर्बाह्य रंगली होती की तिनं मैत्रीणीचा सल्ला गांभीर्यानं घेतलाच नाही.

‘‘तुझं म्हणणं बरोबर होतं शिवांगी…मीच चुकले,’’ आयुषीनं म्हटलं. तिनं हळूहळू शिवांगीला सगळं सांगितलं. शिवांगीही प्रथम स्तब्ध झाली. मग म्हणाली, ‘‘हरकत नाही. तू अजूनही सावर. प्रतीक ही कंपनी सोडतोय. मला त्याच्या एका खास मित्राकडून ही बातमी समजली आहे. तो बंगलोरला जॉब मिळवण्याच्या तयारीत आहे.’’

‘‘मला शंका होतीच. त्याच्या एकूण वागण्यावरून तो मलाही सोडणार हे मला जाणवत होतं.’’

‘‘मग आता तू काय करशील?’’

‘‘काही नाही…’’

‘‘म्हणजे? आश्चर्यानं शिवांगीनं विचारलं. ‘‘त्यानं तुला फसवलंय, तुझं शोषण केलंय, त्याला असंच सोडशील?’’

‘‘नाही शिवांगी. त्यानं मला फसवलं नाही. माझं शोषण केलं नाही. जे घडलं त्याला माझी सहमती होतीच. मुळात मीच चुकले म्हणताना आता परिणामही मीच भोगायला हवेत. मी त्यासाठी तयार आहे.’’

‘‘खरंच सांगतेस?’’ आश्चर्यानं शिवांगी म्हणाली. ‘‘खरंच सावरली आहेत तू?’’

पूर्ण आत्मविश्वासानं आयुष्यी उत्तरली. ‘‘होय, पूर्णपणे.’’

‘‘तुला कधीही माझी गरज पडली तर मला सांग,’’ शिवांगीने तिला आश्वस्त केलं.

आयुषीचे वडिल सरकारी नोकरीत होते. खाऊनपिऊन सुखी. आयुषी त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या शिक्षणावर त्यांनी बराच खर्च केला होता. आता त्यांच्याकडे फार पैसा शिल्लक नव्हता. त्याची गरजही नव्हती. आयुषी नोकरी करतच होती.

त्याचवेळी आयुषीच्या आईचा फोन आला. त्यांच्या गॉलब्लॅण्डरमध्ये स्टोन झाले होते. ऑपरशन करावं लागणार होतं. आईनं तिला येण्याबद्दल सांगितलं. पैसे वगैरे मागितले नव्हते. आयुषीलाच वाटलं थोडे पैसे तिनं त्यांना पाठवले तर वडिलांना आधार होईल. पगाराला अजून अवकाश होता. तिच्या खात्यात पुरेसे पैसे नव्हते. तिनं प्रतीकला म्हटलं, ‘‘मला थोडे पैसे हवेतय’’

आश्चर्यानं प्रतीक आ वासला गेला, ‘‘तुला? पैसे? तुझ्याकडे नाहीत का?’’

‘‘नाहीत. म्हणूनच मागतेय ना?’’ ती असह्यपणे म्हणाली, ‘‘आईचं ऑपरेशन होणार आहे.’’

‘‘तू घरी जाणार आहेस?’’

‘‘विचार करतेय. या निमित्तानं जाऊन येईन. वर्ष दिड वर्षात गेलेच नाहीए.’’

‘‘पैसे नाहीत माझ्याजवळ. कालच मी घरी पाठवलेत पैसे.’’

तो खोटं बोलतोय हे तिला कळलं. ‘‘इतकं धादांत खोटं कसं रे बोलू शकतोस तू? कधी म्हणतोस पैसे शिलल्क ठेवतोय, कधी म्हणतोस घरी पाठवलेत. सगळेच पैसे थेडीच पाठवले असतील? घरात तर एक पैसा खर्च करत नाहीस. माझ्या पैशांवर मजा मारताना तुला लाज वाटत नाही?’’

‘‘तुला माझी गरज आहे. मला तुझी नाही.’’ निर्लज्जपणे तो म्हणाला अन् गाडीची किल्ली उचलून घराबाहेर निघून गेला.

घरी पैसे पाठवण्यासाठी पैसा उभा कसा करावा ते आयुषीला समजेना. स्वत: जाण्यापेक्षा तिनं मैत्रिणीकडून ५० हजार रुपये उसने घेऊन बाबांच्या अकाउंटला भरले.

प्रतीकचा त्याच्या घरच्या मंडळींशी सतत संपर्क होता. सहा महिन्यांनी एकदा तो घरी जाऊन येत असे. आयुषीच गेली दोन वर्षं घरी गेली नव्हती. फोनवर बोलायची. पण अजून नोकरी नवी आहे, कंपनी अमेरिकेला पाठवणार आहे वगैरे कारणं सांगून ती घरी जाणं टाळत होती. आईची इच्छा होती आयुषीनं लग्न करावं पण आयुषी तर लग्नाच्याही पुढं निघून गेली होती.

प्रतीक सुट्टी घेऊन त्याच्या घरी गेला होता. आयुषीनंही सुट्टी घेतली अन् आईबाबांना भेटायला गेली. इतक्या दिवसांनी त्यांना भेटल्यावर तिला किती सुरक्षित अन् प्रसन्न वाटलं. तिला जाणवलं, प्रतीकच्या सहवासात तिला असं सुरक्षित वाटत नव्हतं. जुन्या आठवणी काढताना आईबाबांना गहिवरून येत होतं. तिच्या येण्याचा त्यांना मनापासून आनंद झाला होता. आठ दिवस ती तिथं आनंदात राहिली. मोबाइलही तिनं बंद करून ठेवला होता.

आईबाबांच्या प्रेमळ आश्वासक सहवासात ती सुखावली. तिला प्रतीकची आठवणही आली नाही. ती मुंबईला परतली अन् तिनं प्रतीकला फोन लावला, तो बंद होता. तिला थोडी काळजी वाटली. गेले आठ-दहा दिवस त्यांच्यात संपर्कच नव्हता.

घरात फार एकटं वाटत होतं. उदास वाटत होतं. प्रतीक कसाही असला तरी तिनं त्याच्यावर खरोखर प्रेम केलं होतं. पूर्ण विश्वासानं ती त्याच्या स्वाधीन झाली होती. शेवटपर्यंत ते नातं तिला खरं तर निभवायचं होतं. पण प्रतीकच्या मनात दुसरंच काहीतरी होतं.

ती ऑफिसला पोहोचली अन् शिवांगी तिला भेटायला आली. ‘‘कशी आहेस शिवांगी?’’ तिनं विचारलं.

‘‘मी बरी आहे. तुला कळलं का? प्रतीकनं ही कंपनी सोडली. मागच्या आठवड्यातच त्यानं ईमेलवर त्याचा राजीनामा पाठवलाय.’’

‘‘हं!’’

‘‘मला ठाऊक होतं. प्रतीकसारखी भ्रमर अन् लोभी वृत्तीची मुलं लग्न, जबाबदारी वगैरेवर विश्वास ठेवत नाहीत. प्रेम म्हणजे त्यांच्या लेखी टाइमपास असतो.’’

आयुषीनं शिवांगीकडे बघितलं.

‘‘आयुषी, हे कधी ना कधी घडणारच होतं. तुला धक्का बसणं स्वाभाविक आहे. पण तरीही तुला सावरायला हवं. खरं तर आता तू स्वतंत्र आहेस. आपल्या मर्जीनं आयुष्य जगू शकतेस. चांगला नवरा निवड. सुखाचा संसार कर. गेली दोन वर्षं एक दु:स्वप्न होतं असं समज.’’

‘‘खरंय शिवांगी, तुझं म्हणणं मला पटतंय. मी पूर्वीही भीत्री अन् नेभळट नव्हते. आत्ताही नाही. मी कणखर आहे. सारी परिस्थिती धीरानं हाताळेन.’’

‘‘मी तुझ्याबरोबर रात्री सोबतीला येऊ का?’’

‘‘नाही गं! त्याची गरज नाहीए,’’ पूर्ण आत्मविश्वास तिच्या बोलण्यावागण्यात दिसत होता.

सायंकाळी घरी गेल्यावर तिनं शांतपणे घरावर नजर फिरवली. ज्या वस्तू तिनं प्रतीकबरोबर खरेदी केल्या होत्या त्या वेगळ्या काढल्या. एका मोठ्या चादरीत त्या बांधून त्याचं गाठोडं बांधलं.

रात्री तिनं ते गाठोडं गाडीत घातलं अन् शहराच्या बाहेर एक मोठा तलाव होता, त्या तलावात ते गाठोडं तिनं शांतपणे ढकलून दिलं. थोडा वेळ पाण्यात बुडबुडे अन् तरंग उठले. मग सगळं शांत झालं.

तिही अगदी आतपर्यंत शांत झाली होती. डोळ्यापुढचं धुकं विरलं होतं. विवेकाची उन्हं पसरली होती. खूप प्रसन्न अन् हलकं वाटत होतं.

व्हॅलेंटाइन डे (प्रेमाचा स्विकार)

कथा * सिद्धार्थ जानोरीकर

सकाळी सकाळीच मनीषानं उत्स्फुर्तपणे विचारलं, ‘‘बाबा, आज आईला काय गिफ्ट देताय तुम्ही?’’

‘‘आज काय विशेष आहे बुवा?’’ प्रश्नार्थक चेहऱ्यानं मी लेकीला विचारलं?

‘‘कमाल करता बाबा तुम्हीसुद्धा! गेली कित्येक वर्ष तुम्ही आजचा हा दिवस विसरता आहात. अहो, आज ना, व्हॅलेंटाइन डे आहे. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो त्याला आजच्या दिवशी काहीतरी भेट द्यायची असते.’’

‘‘ते मला ठाऊक आहे, पण इंग्रजांच्या या असल्या फालतू चालीरिती आपण का म्हणून पाळायच्या?’’

‘‘बाबा, प्रश्न देशीविदेशीचा नाहीए, फक्त प्रेम व्यक्त करण्याचा आहे.’’

‘‘मला नाही वाटत खऱ्या प्रेमाला कधी व्यक्त करण्याची गरज असते म्हणून. तुझ्या आईच्या आणि माझ्यामधलं प्रेम तर जन्मोजन्मीचं आहे.’’

‘‘मनू, तूसुद्धा पण कुणाला समजावण्याचा प्रयत्न करते आहेस?’’ माझी जीवन संगिनी तिरसटून म्हणाली. ‘‘हे सगळं यांना सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. ज्यात पाच दहा रूपयेच खर्च होण्याची शक्यता असते. तेवढंदेखील गिफ्ट हे कधी देऊ शकत नाहीत.’’

‘‘सीमा, अगं असं काय बोलतेस? माझ्या या हृदयाचा तरी थोडा विचार कर…अगं, महिन्याचा अख्खा पगार तुला हातात आणून देतो ना?’’ मी दु:खी चेहऱ्यानं अन् भरल्या गळ्यानं बोललो.

‘‘हो आणि पै न् पैचा हिशेबही मागून घेता ना? नाही दिला तर भांडण काढता…एक तर माझा सगळा पगार जातो कार आणि घराचे हप्ते फेडण्यात…स्वत:च्या मर्जीनं खर्चायला शंभर रूपयेही मिळत नाहीत मला…’’

‘‘हा आरोप तू करतेस? अगं, ठासून कपाट भरलंय साड्यांनी…काय दिवस आलेत. लेकीच्या नजरेत बापाची किंमत कमी व्हावी म्हणून आईच खोटं बोलतेय?’’

‘‘पुरे झाला नाटकीपणा. एक सांगा. त्या कपाटातल्या किती साड्या तुम्ही आणून दिल्या आहेत मला? प्रत्येक सणावाराला माझ्या माहेरून साड्या मिळतात मला. म्हणून निदान मैत्रिणींपुढे तोऱ्यात वावरतेय मी…नाही तर कठीणच होतं.’’

‘‘बाबा, आईला खूष करायला कुठं तरी दोन-चार दिवस फिरवून आणा ना?’’ मनीषानं आमचं भांडण थांबवण्यासाठी विषय बदलला.

‘‘पुरे गं तुझं!! या घराच्या रामरगाड्यातून बाहेर पडून थोडा मोकळा श्वास घेईन, असं भाग्य नाहीए माझं!’’ स्वत:चं कपाळ बडवून घेत सीमा नाटकीपणानं म्हणाली.

‘‘कशाला खोटं बोलतेस गं? दरवर्षी तू आपल्या भावाकडे महिना-पंधरा दिवस राहून येतेस ना?’’ मी लगेच तिला आठवण करून दिली.

‘‘बाबा, मी सिमला किंवा मसुरीविषयी बोलत होते.’’ मनीषानं विषय स्पष्ट करून सांगितला.

‘‘तू का अशा नको त्या गोष्टी बोलते आहेस गं? कधीही मी यांना एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊयात ना, असं म्हटलं की काय म्हणायचे ठाऊक आहे? अगं अंघोळ करून ओल्या कपड्यात गच्चीवर फेऱ्या मार…मस्त हिल स्टेशनला गेल्यासारखं वाटेल.’’

‘‘अरेच्चा? गंमत केली तर तेवढंही लेकीला सांगून माझ्याविरूद्ध भडकवते आहेस तिला?’’ मला रागच आला.

माझ्या रागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सौ. आपल्या तक्रारी सांगतच होती. ‘‘यांच्या चिक्कूपणामुळे खूप खूप सहन करावं लागलंय मला. कधी तरी मला वाटायचं, आज घरी नको करूयात स्वयंपाक, हॉटेलमध्ये जेऊयात. तर हे माझ्या सुग्रणपणाचं इतके गोडवे गायचे की काय सांगू? जणू मीच जगातली सर्वोत्कृष्ट कुक आहे…’’

‘‘पण आई, हा तर बाबांचा चांगलाच गुण झाला ना? तुझं, तुझ्या सुग्रणपणाचं कौतुक करतात…’’ मनीषानं माझी बाजू घेतली.

‘‘डोंबलाचं कौतुक…’’ सीमा कडाडली, फक्त पैसे वाचवायचे, हॉटेलचा खर्च करायला नको म्हणून हे सगळं!’’

‘‘ओफ!’’ लेकीनं माझ्याकडे अशा नजरेनं बघितलं जणू मी खलनायक होतो.

‘‘माझा वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस असो, फक्त पाव किलो मिठाई आणली की यांचं कौतुक संपलं! रसमलाई नाही तर गुलाबजाम…तेही फक्त पाव किलो…कधी फुलांचा बुके नाही की साडी अथवा दागिना नाही.’’ सीमाचा राग कडकलेलाच.

मनु, तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. या व्हॅलेंटाइन डेनं हिचं डोकंच फिरलंय. माझ्या बायकोसारख्या सरळसाध्या बाईचं डोकं फिरवणारा हा वाह्यात दिवस मी कधीही साजरा करणार नाही.’’ मी ठामपणे माझा निर्णय जाहीर केला. दोघी मायलेकी माझ्यावर रागावल्या होत्या बहुतेक. दोघींपैकी कुणी एक, काही बोलणार तेवढ्यात बाहेरच्या दाराची घंटी वाजली.

मी दार उघडलं अन् आश्चर्यानं ओरडलो, ‘‘अरे बघा तरी किती सुंदर पुष्पगुच्छ आलाय…’’

‘‘कुणी पाठवलाय?’’ माझ्या?शेजारी येऊन उभी राहिली होती सीमा. तिला नवल वाटलं होतं.

‘‘मुळात कुणाला पाठवलाय?’’ माझ्या हातातून तो बुके घेऊन त्यावरील कार्डावरचं नाव वाचण्याचा प्रयत्न करत मनीषा म्हणाली. मी पुन्हा तिच्या हातून तो बुके माझ्या हातात घेतला. या कार्डावर लिहिलंय, ‘‘हॅप्पी व्हॅलेंटाइन डे.’’

‘‘माय स्वीट हार्ट.’’ कोण कुणाला स्वीट हार्ट म्हणतंय.

‘‘ते काही कळत नाहीए.’’ मी बावळटासारखा बोललो.

‘‘मनु, इतका सुंदर बुके तुला कुणी पाठवलाय?’’ सीमानं अगदी गोड आवाजात लेकीला विचारलं.

पुष्पगुच्छ स्वत:च्या हातात घेऊन मनीषानं तो चारही बाजूंनी नीट निरखून बघितला. मग, जरा वैतागून म्हणाली, ‘‘मॉम, मला काहीच कळत नाहीए.’’

‘‘राजीवनं पाठवला असेल का?’’

‘‘छे छे एवढा महाग बुके त्याच्या बजेटच्या बाहेर आहे.’’

‘‘मग मोहितनं?’’

‘‘तो तर हल्ली त्या रीतूच्या मागेपुढे शेपूट हलवत फिरतोय.’’

‘‘दीपक?’’

‘‘नो मॉम, वी डोंट लाइक ईच अदर व्हेरी मच…’’

‘‘मग कुणी बरं पाठवली असतील इतकी सुंदर फुलं?’’

‘‘एक मिनिट! तुम्ही मायलेकी जरा सांगाल का? आता जी नावं घेतली ती कोण मुलं आहेत?’’ माझ्यातला बाप जरबेनं म्हणाला.

‘‘इश्श! ती सगळी मनीषाच्या कॉलेजातली मुलं आहेत.’’ झटकून टाकल्यासारखं सीमानं म्हटलं.

‘‘पण ही सगळी नावं तुला कशी माहीत?’’

‘‘अरेच्चा? मनीषा रोज मला तिच्या कॉलेजमधल्या घडामोडी सांगत असते ना? मी काही दिवसरात्र तुमच्याप्रमाणे पैशापैशाचा हिशेब करत बसत नाही.’’

‘‘मी तो हिशेब ठेवतो म्हणूनच कुणापुढे हात पसरावा लागत नाही…समजलं? ते सोड, विषय सध्या वेगळा आहे…ज्या मुलांची नावं तू आता घेतलीस…’’

‘‘ती सगळी तिच्या कालेजमधली मुलं आहेत. मित्र आहेत तिचे.’’

‘‘मनीषा, तू कॉलेजमध्ये अभ्यासासाठी जातेस ना? की फक्त सोशल सर्कल वाढवते आहेस?’’ मी विचारलं.

‘‘बाबा, माणूस म्हणून व्यक्तित्त्वाचा पूर्ण विकास व्हायला हवा ना?’’ मनीषा फुत्कारली.

‘‘ते खरंय, पण पुष्पगुच्छ पाठवणाऱ्यांची संभावित यादी बघून मी जरा धास्तावलो आहे.’’

‘‘जस्ट रिलॅक्स बाबा! हल्ली मुलं देणंघेणं फार कॉमन, अगदी साधी गोष्ट आहे. फुलं देताना, ‘मी तुद्ब्रयावर प्रेम करतो/करते, तुझ्याशिवाय जगूच शकत नाही’ असं कुणी म्हणत नाही. तो फालतूपणा ठरतो आता.’’ लेक अगदी कूल होती.

‘‘हल्ली घटस्फोटाचं प्रमाण का वाढलंय, या विषयावर आपण नंतर कधी तरी चर्चा करूयात. पण आता मला एवढीच खात्री करून घ्यायची आहे की हा पुष्पगुच्छ तुला पाठवला गेलेला नाहीए, हे नक्की ना?’’

‘‘सॉरी पप्पा, हा बुके माझ्यासाठी नाहीए…’’

तिचं उत्तर ऐकून मी मोर्चा सीमाकडे वळवला. थोडं तिरकसपणे विचारलं, ‘‘तुझ्यावर जीव टाकणाऱ्या १०-२० लोकांची नावं तूही सांगून टाक राणी पद्मावती.’’

‘‘आता ही पद्मावती कुठून उपटली मध्येच?’’ मनीषानं म्हटलं.

‘‘मिस इंडिया, थोडा वेळ गप्प बसता येईल का?’’ मी ओरडलो तशी मनीषा गप्प बसली.

‘‘फुकटे प्रियकर पाळत नाही मी. त्यापेक्षा एखादं कुत्र पाळेन.’’ सीमा रागानं माझ्याकडे बघत फुत्कारली.

‘‘बाबा, मला काही सांगायचंय…’’ मनीषाच्या चेहऱ्यावर लबाड हसू अन् खट्याळ भाव होता.

‘‘तुला गप्प बसायला सांगितलं होतं ना? पण नाही, शेवटी तूही स्त्री आहेस. कुठलाही पुरूष स्त्रीला गप्प बसवू शकत नाही…ते सोड, काय म्हणायचंय तुला?’’

‘‘बाबा, मला वाटतं, मीना मावशीच्या मुलीच्या लग्नात तुमचे चुलत भाऊ, ते…रवीकाका आले होते…त्यांचे मित्र नीरज…त्यांनी तर हा बुके मॉमसाठी पाठवला नसेल?’’

‘‘म्हणजे, तुला म्हणायचंय, तो मिशीवाला नालायक तुझ्या आईवर लाइन मारतोय?’’

‘‘मिशीचं सोडा बाबा, पण तो माणूस स्मार्ट आहे.’’

‘‘तुमचं काय म्हणणं आहे बाईसाहेब?’’ मी सीमाला विचारलं.

‘‘मी कशाला काय म्हणू? तुम्हाला जी काही विचारपूस चौकशी करायची असेल, ती त्या मिशीवाल्याकडे करा.’’ झुरळ झटकावं तसा सीमानं विषय झटकला.

‘‘अगं, पण निदान इतकं तरी कळू देत की तू तुझ्याकडून त्याला काही संकेत दिला होता का?’’

‘‘ज्यांना दुसऱ्यांच्या बायका बघून तोंडाला पाणी सुटतं, त्यांना साधं हसून कुणी नमस्कार केला तरी संकेत वाटतो?’’

‘‘मनू, मला नाही वाटत त्या मिशीवाल्याकडे तुझी आई प्रभावित वगैरे झाली असेल…इतर कुणाची नावं सुचव.’’ मी लेकीला डोळा मारला.

‘‘अगंऽऽ! मला वाटतं,  ममाच्या ऑफिसमधले ते आदित्य साहेब ते ऑफिसच्या पार्टीत नेहमी ममाभोवती घुटमळत असतात…’’ काही क्षण विचार करून लेकीनं आपल्या आईच्या चाहत्यांच्या यादीत एका नावाची भर घातली.

‘‘तो इतका सुंदर बुके नाही पाठवणार…’’ मी नकारार्थी मान हलवंत बोललो. ‘‘एक तर त्याची पर्सनॅलिटी काहीच्या काहीच आहे. शिवाय बोलताना किती थुंकी उडवत असतो.’’

‘‘आठवलं…बाबा…आपल्या गल्लीच्या तोंडाशी राहणारे ते महेशजी? ते असतील का?’’ लेकीनं विचारलं.

‘‘त्यांचं नाव कशाला घेते आहेस तू?’’

‘‘बाबा, त्यांचा घटस्फोट झालाय अन् सकाळी आई फिरायला जाते. तेव्हाच तेही फिरत असतात. कदाचित त्यांचा काही गैरसमज झाला असेल…’’

‘‘तू म्हणतेस तसं असू शकतं बरं का?’’

‘‘काय असू शकतं? डोंबलं तुमचं?’’ सीमा एकदम भडकली.

‘‘पार्कात ते म्हातारं सारखं कफ थुंकत चालत असतं. अन् तुम्ही दोघं, प्लीज असल्या कुणाबरोबर माझं नाव जोडू नका सांगून ठेवते…जर हा पुष्पगुच्छ माझ्यासाठी असेल तर पाठवणाऱ्यांचं नाव मला ठाऊक आहे.’’ सीमा चक्क हसली.

‘‘क…क…कोण…कोण आहे तो?’’ तिला हसताना बघून मी एकदम नर्व्हस झालो. चक्क ‘ततपप’ झालं.

‘‘नाही सांगणार…’’ सीमाच्या चेहऱ्यावर गूढ हास्य…मी गांगारलो.

माझ्या मन:स्थितीची अजिबात कल्पना नसलेली मनीषा सहजपणे म्हणाली, ‘‘आई, हा बुके पप्पांसाठीही असू शकतो ना?’’

‘‘नो!’’ ठामपणे सीमानं म्हटलं अन् माझ्याकडे बघून हसायला लागली.

‘‘मायासाठी का नसावा?’’ मी भडकलोच. ‘‘अजूनही बायका माझ्यावर लाइन मारतात. त्यांच्या डोळ्यांत प्रेम दिसतं माझ्याविषयी.’’

‘‘मम्मा, बाबांची पर्सनॅलिटी तशी वाईट नाहीए…’’ मनीषा म्हणाली.

‘‘एक्सक्यूज मी…पर्सनॅलिटी तशी वाईट नाहीएचा काय अर्थ?’’ मी संतापून मनीषाला विचारलं. माझ्या संतापाकडे दुर्लक्ष करून ती चक्क हसायला लागली.

‘‘मनू, प्रश्न पर्सर्नेलिटीचा नाहीए…यांच्या चिक्कूपणाचा आहे. अगं स्त्रियांना पैसे खर्च करणारे पुरूष आवडतात. हे जर पैसेच खर्च करणार नाहीत तर कोण स्त्री यांच्यावर भाळेल?’’

‘‘आई, तुला कुणा एकाही बाईचं नाव आठवत नाहीए, जी बाबांना हा बुके गिफ्ट म्हणून पाठवेल?’’

‘‘नाही.’’

‘‘बाबा, काय हे? तुमची मार्केट व्हॅल्यू तर अजिबातच नाहीए…’’ लेकीनं मला सहानुभूती दाखवली.

‘‘पोरी, घर की मुर्गी दाल बराबर, तसं चाललंय हे…’’ मी ऐटीत आपली कॉलर टाइट केली तर सीमा हसायला लागली.

‘‘आता तर खरंच अवघड झालंय. कुणी पाठवला असेल हा बुके?’’ मनीषाच्या चेहऱ्यावर आता काळजी दिसू लागली. सीमाही त्रस्त होती.

काही वेळ सगळेच गप्प होतो. मग मीच मधाचा गोडवा अन् अधिकाऱ्याचा रूबाब आवाजात आणून विचारलं, ‘‘सीमा, प्रेमभावना प्रकट करणारा हा सुंदर पुष्पगुच्छ मी तुला पाठवला, तुझ्यासाठी खरेदी केला असं नाही का होऊ शकत?’’

‘‘इंपॉसिबल! याबाबतीतली तुमची कंजूसी तर जगप्रसिद्ध आहे,’’ सीमा फाडकन् उत्तरली.

माझ्या चेहऱ्यावर दु:ख दाटून आलं. त्यांना तो माझा अभिनय वाटला अन् दोघी खळखळून हसू लागल्या.

मग हसण्याचा भर थोडा ओसरल्यावर सीमानंही नाटकीपणानं एक दीर्घ उसासा सोडून म्हटलं, ‘‘एवढं कुठलं माझं मेलीचं भाग्य की नवरा एवढा महागाचा, सुंदर बुके मला भेट देईल?’’

‘‘मला वाटतं फूलवाल्यानं चुकून आपल्याकडे बुके दिला असावा, थोड्याच वेळात तो हा बुके परत घ्याला येईल.’’ मनीषानं एक नवाच विचार मांडला.

‘‘हा कागद बघा, यावर आपल्या घराचा पत्ता लिहिलाय. अन् हे अक्षर तुम्ही दोघी ओळखता.’’ मी खिशातून एक कागद काढून दाखवला.

‘‘हे तर तुमचंच अक्षर आहे.’’ आश्चर्यानं मनीषा म्हणाली.

‘‘पण हा कागद तुम्ही आम्हाला का दाखवता आहात?’’ कपाळाला आठ्या घालून सीमानं विचारलं.

‘‘ही चिठ्ठी घेऊनच तो फुलवाल्याचा पोरगा आमच्या घरापर्यंत आला होता. मला वाटतं, माझ्या शरीरातही एक प्रेम करणारं हृदय धडधडत असतं हे तुम्ही विसरला आहात. सतत पैशाच्या हिशोबात मी गुंतलेला असतो हे खरंय पण उत्पन्न कमी अन् खर्च जास्त यामुळे मी असा झालोय…मलाही माझं प्रेम व्यक्त करावंसं वाटतं पण ते व्यक्त करता येत नाही. अव्यक्त प्रेम माझ्या माणसांना कळत नाही.’’ मी आपल्या भावना व्यक्त केल्या अन् थकलेल्या पावलांनी बेडरूमकडे जाऊ लागलो.

‘‘आय एम सॉरी बाबा, तुम्ही तर माझे लाडके हिरो आहात.’’ मला बिलगंत मनीषानं म्हटलं. तिचे डोळे पाणावले होते.

‘‘मलाही क्षमा करा डार्लिंग, माय स्वीट हार्ट.’’ सीमाही जवळ येऊन बिळगली. तिचेही डोळे डबडबले होते.

मी त्यांना दोघींना प्रेमानं जवळ घेऊन थोपटलं अन् म्हणाले, ‘‘क्षमा मागायची   गरजच नाहीए. आजच्या या व्हॅलेंटाइन दिवसानं आपल्याला धडा शिकवला आहे. आता यापुढे मी ही लवकर अन् वरचेवर माझं प्रेम व्यक्त करत जाईन. मला  बदलायलाच हवं. नाहीतर खरोखरंच कोणी महाभाग पुढल्या व्हॅलेंटाइन डेला माझ्या हृदयेश्वरीला फुलांचा गुच्छ पाठवायचा…’’   मी म्हणालो.

‘‘इश्श! भलतंच काय? माझ्या मनात फक्त तुम्हीच आहात. तिथं दुसरा कुणी येऊच शकणार नाही.’’ सीमानं म्हटलं…अन् ती चक्क लाजली.

‘‘आई, मला पण असं प्रेम करण्याची अन् एकच मूर्ती मनांत जपण्याची कला शिकव हं!’’ खट्याळपणे हसत मनीषानं आम्हां दोघांना मिठी मारली. आम्ही तिघं एकमेकांवर किती प्रेम करतो अन् एकमेकांच्या किती जवळ आहेत आम्हाला कळलं होतं.

जुळून आलेलं समीकरण

कथा * सुमन बाजपेयी

‘‘पुरे गं तुझं…सत्यवचन अन् प्रामाणिकपणा हे अगदी पोकळ शब्द आहेत. प्रिंसिपल्स म्हणे…काय देतात ती प्रिन्सिपल्स ज्यांना आयुष्यात धाडस जमत नाही ना, तेच असे बुळबुळीत शब्द वापरून जगत राहतात. तत्त्व, खरेपणा, परिश्रम, घाम गाळणं हे सगळं करून तू तरी काय मोठं मिळवलंय आयुष्यात?’’ सुकांत जोरजोरात ओरडत होता. नीलाला त्या क्षणी आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहोत असं वाटत होतं. तिच्या आयुष्याची, तिच्या व्यक्तिमत्त्वाची, तिच्या जीवन मूल्यांची लक्तरं करून वेशीवर टांगण्यात सुकांतला असूरी आनंद मिळत होता. तिचं वागणं कसं चूक आहे हे सिद्ध करण्याचं काम त्याला फार आवडत होतं.

‘‘तू ज्या कमिटमेंटबद्दल बोलतेस ती कमिटमेंट म्हणजे नेमकं काय असतं? आजच्या काळात असे शब्द म्हणजे पोकळ बुडबुडे ठरतात. कोण चिकटून बसतंय आपल्या शब्दांना? अगं सख्खे, अगदी आपलेही वेळ येते, तेव्हा शब्द फिरवतात अन् तू आपली कमिटमेंटला धरून बसतेस.’’

‘‘म्हणजे तुला असं म्हणायचंय की फक्त खोटेपणानं वागणारी, भ्रष्टाचारी, लबाड माणसंच आयुष्यात यशस्वी होतात?’’ सुकांतच्या एवढ्या भडिमारानंतरही नीला माघार घ्यायला तयार नव्हती. बालपणापासून झालेले संस्कार सहजी का आयुष्यातून नाहीसे होतात? अन् त्याला काय हक्क होता तिच्या विचारसरणीला धुडकावून लावण्याचा? या माणसाशी गेली २५ वर्षं ती संसार करतेय. सगळं काही तिनं त्याला समर्पित केलंय अन् तो तिच्या प्रामाणिकपणाला, निष्ठेला, सत्यवचनी असण्यालाच दूषणं देतोय? तिनं आयुष्यात काहीच मिळवलं नाही असं ठामपणे म्हणतोय? अर्थात् सुकांतच्या कनव्हिंसिंग कॅपॅसिटीबद्दल अन् गोष्टी मॅन्युपुलेट करण्याच्या क्षमतेबद्दल कुणाचंच दुमत होणार नाही…तर मग त्या क्षणी नीलालाही आपण हरलो, फेल्युअर ठरलो असं वाटलं तर त्यात गैर काहीच नव्हतं.

‘‘तू हा पोकळ आदर्शवाद न जपता सरळ थोडी आडमार्गानं गेली असतीस, वरिष्ठांचं लांगुलचालन केलं असतं तर आज करिअरमध्ये कुठल्या कुठं पोहोचली असतीस. तूच विचार कर, आज तू कुठं आहेस अन् तुझे ज्यूनिअर कुठच्या कुठं पोहोचलेत ते. तुझ्या योग्यतेचं काय लोणचं घालायचं का? तुझी योग्यता कुणाला समजलीय?’’ सुकांतचा चेहरा अगदी बिभत्स दिसू लागला होता. आज जणू नीलाचा अपमान करण्याचंच त्यानं ठरवलं होतं. स्वत:चा हलकटपणा जेव्हा लपवायचा असतो, तेव्हा दुसऱ्याच्या योग्यतेचे, सन्मानाचे वाभाडे काढणं हा अगदी सोपा मार्ग असतो.

‘‘तर मग मी तुझ्याशी एकनिष्ठ राहिले, समर्पित राहिले, नातं प्रामाणिकपणे निभावलं तेही माझं चुकलंच म्हणायचं? मला अशी निष्ठा ठेवायला नको होती…’’ तिनं थोडं तिखटपणे म्हटलं.

‘‘मी नात्याबद्दल बोलत नाहीए. उगीच कुठली तरी गोष्ट कुठं तरी नेऊन ठेवू नकोस. मी तुझ्या करिअरबद्दल बोलतोय,’’ सुकांतनं म्हटलं.

‘‘का बरं? हा नियम तर प्रत्येक बाबतीत लागू व्हायला हवा. तू आपल्या मर्जीनं हवं तेव्हा, हवं तसे नियम बदलू शकत नाहीस अन् माझ्या करिअरबद्दल बोलायचं तर मी आपल्या कामात संतुष्ट आहे. माझ्या वागणुकीमुळे मला ऑफिसात आणि बाहेर इतर ठिकाणीही मान मिळतो. तू कधीच मला मानानं वागवलं नाहीस. कारण तुझ्यात ती समजूतच नाहीए. कुणाला चांगलं म्हणतोस तू? कुणाशी तरी पटतं का तुझं?’’ नीलाच्या मनातला इतकी वर्षं दाबून ठेवलेला संताप आता उफाळून आला होता. खरं तर तिला स्वत:लाच आज आश्चर्य वाटत होतं की इतकं स्पष्ट बोलण्याचं धाडस तिच्यात आलं कुठून?

‘‘उगाच मूर्खासारखं बोलू नकोस, माझा ताबा सुटला तर…’’ सुकांत आता गडबडला होता. इतक्या वर्षांत नीलानं असं काही त्याला ऐकवलं नव्हतं.

‘‘तुझा ताबा नेहमीच सुटतो…काय करशील? शिव्या देशील? मारशील? घराबाहेर काढशील? याशिवाय काय करू शकतोस तू? मला वाटतं आपण हा विषय इथंच संपवूयात.’’ नीला शांतपणे म्हणाली. तिला विषय वाढवायचा नव्हता. वाढवूनही निष्पन्न काहीच होणार नव्हतं. गेल्या पंचवीस वर्षांत सुकांत बदलला नव्हता, तो आता काय बदलणार होता? जो स्वत:च्या बायकोला मान अन् आदर देऊ शकत नव्हता त्याच्याशी वाद तरी कशाला घालायचा? नीलाला वाईटफक्त एकाच गोष्टीचं वाटायचं की तिच्या एकुलत्या एका मुलाला, नीरवला, ती वडिलांच्या इन्फुलएन्सपासून वाचवू शकली नव्हती. नीरव केवळ वडिलांचंच ऐकत होता. त्यांचंच म्हणणं त्याला योग्य वाटत होतं. लहानपणी तिनं जे संस्कार त्याला दिले होते, ते त्यानं कधीच गाठोडं बांधून गच्चीवर भिरकावले होते. त्यानंतर त्यांने कधी तिकडे ढुंकुनही बघितलं नव्हतं. ती त्याला खूप समजवायची. ‘‘नीरव, अरे, स्वत:च्या डोळ्यांनी जगाकडे बघ, बाबांचा चष्मा लावून बघू नकोस. पण तोही तिचा अपमान करायचा. तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. ती अपमानाचा घोट गिळून गप्प बसायची. शाळाकॉलेज संपून नोकरीला लागला तरीही बाबाच त्याचं दैवत होते. त्यांच्याच मार्गावरून तो चालत होता.

मुलगा चुकीच्या मार्गानं जातो आहे, हे कळत असूनही तिला काहीही करता येत नव्हतं. हे दु:ख तिला दिवसरात्र छळत होतं. नीरवच्या काळजीमुळेच ती सुकांतशी भांडली होती. पण सुकांतनं आपली चूक कबूल करून नीरवला चांगल्या मार्गाला लावण्याऐवजी नीलालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. ही गोष्ट खरी होती की लांगूलचालन, लांडीलबाडी, खोट्यानाट्या चहाड्या यापासून ती कायम दूर राहिली होती. त्यामुळे ऑफिसात अन् समाजात तिच्याविषयी आदरयुक्त दबदबा होता. पण बॉसच्या मागण्या पूर्ण करून भराभर प्रमोशन्स घेणाऱ्या तिच्या ज्यूनियर्ससारखं ती वागू शकली नव्हती. स्वत:ची जीवनमूल्य, स्वत:चे संस्कार याविषयी ती अतिशय दक्ष होती अन् त्याबद्दल तिला समाधान अन् अभिमानही होता.’’

कित्येकदा सुकांतची वागणूक बघून तिला भीती वाटायची. कधीतरी आपलं खरंच चुकतंय का अशी शंकाही यायची. पण निर्मळ मन, निर्मळ चारित्र्य यामुळे ती कधीच वेडंवाकडं वागू शकली नव्हती.

सुकांत तिला ऐकवायचा, ‘‘बघ तू, मला अन् नीरवला टोमणे देतेस ना? एक दिवस तो कुठल्या कुठं पोहोचेल…किती भराभर प्रोग्रेस करतो आहे. आजच्या काळाला योग्य असंच वागतोय तो. तुम्ही लोकांना धक्का दिला नाही तर ते तुम्हाला धक्का देऊन पुढे निघून जातील. गरज पडली तर दुसऱ्याची संधीही हिसकावून घेण्याची धमक हवी माणसात.’’

नीलाच्या मनात आलं, ‘‘तू, त्या निरागस मुलाला माझ्याविरूद्ध प्यादं म्हणून का वापरतो आहेस? भांडण माझ्यातुझ्यात, आपल्या विचारात आहे. त्याला कशाला मध्ये आणतोस?’’ पण ती बोलू शकली नाही. सुकांत तिच्याकडे बघून उपहासानं हसत होता.

त्या रात्री बराच उशीर झाला तरी नीरव घरी आला नव्हता. नीलाला काळजी वाटत होती. ती व्हरांड्यात फेऱ्या मारत त्याची वाट बघत होती. मोबाइलही लागत नव्हता. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. तो सुखरूप असेल ना? त्याला काही झालं नाही ना? ऑफिसात कुणी फोन उचलत नव्हतं. साडे अकरा वाजून गेलेले. सुकांत दारू पिऊन जेवण करून ढराढूर झोपला होता.

अचानक तिचा मोबाइल वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. थरथरत्या हातानं तिनं फोन घेतला.

‘‘नीरवच्या घरून बोलताय?’’

नीलानं घाबरून विचारलं, ‘‘काय झालंय त्याला? तो बरा आहे ना? कुठं आहे? तुम्ही कोण बोलताय?’’

‘‘तुही शांत व्हा…नीरव बरा आहे. फक्त तो पोलीसांच्या ताब्यात आहे…कैदेत आहे…अरेस्ट केलं त्याला. कंपनीत घोटाळा केल्याची तक्रार कंपनीच्या मालकांनी केलीय. म्हणून त्याला अटक झाली आहे.’’

तेवढ्यात फोन समरनं घेतला. समर नीरवचा पक्का मित्र होता. ‘‘काकू, मी नीरवसोबत आहे…तुम्ही फक्त काकांना पाठवा. त्याला जामिन मिळाली की सुटका होईल.’’

तिनं गाढ झोपलेल्या सुकांतला उठवलं. सगळी रात्र त्यांची तुरुंगात गेली. गजाआड उभ्या असलेल्या आपल्या मुलाला बघून नीलाचे डोळे भरून आले. आई म्हणून ती किती कमी पडली होती…सुकांत मात्र अगदी गप्प होतात. त्यानं तिला किंवा नीरवला काहीही म्हटलं नाही. तो मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होता. नीलानं तिच्या काही हितचिंतक परिचितांना फोन केले. शेवटी एकदाची जामिनावर सुटका द्ब्राली. नीरवच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत होता. लाजेनं तो अर्धमेला झाला होता. मनातल्या मनात तो स्वत:ला दूषणं देत होता. आईची क्षमा मागत होता. आईचीच शिकवण योग्य होती हे त्याला कळलं होतं.

घरी पोचेतो सायंकाळ झाली होती. आपल्याच विचारात गुंग होती तिघंही. संपूर्ण रात्र अन् सगळा दिवस धावपळीत गेला होता. प्रचंड दमणूक झाली होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. त्याक्षणी ती शांतताच फार गरजेची होती.

‘‘आई मला क्षमा कर,’’ म्हणंत नीरवनं तिला मिठी मारली. तो हमसून हमसून रडत होता. नीला त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती.

‘‘तू का क्षमा मागतो आहेस? सगळी चूक खरं तर माझीच आहे. मीच तुझ्यावर असे वाईट संस्कार केले. खोटेपणा, प्रमोशनसाठी नको त्या गोष्टी करणं मी तुला शिकवलं होतं. आज जे काही घडलं त्याला मीच जबाबदार आहे. नीला, मला क्षमा कर. मी तुझा अपराधी आहे. सतत मी तुझा उपहास केला, अपमान केला, सगळीच समीकरणं चुकत होती माझी. पण मला आज कळलं, जीवनमूल्य खरीच महत्त्वाची असतात. तिच माणसाला उत्तम आयुष्य जगायला मदत करतात. ती पोकळ नसतात, उलट आपल्याला ठाम राहायला मदत करतात. प्रामाणिकपणा, खरेपणा, श्रमप्रतिष्ठा या पुस्तकी गोष्टी नाहीत…तोच जीवनाचा आधार आहे…’’ सुकांत बोलत होता. नीलाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या.

तिनं नीरवचे अश्रू पुसले. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. आज तिच्यातली आई विजेती ठरली होती. तिच्यापासून दुरावलेला तिचा मुलगा तिला परत भेटला होता. आता तिच्या आयुष्याची सगळी समीकरणं बरोबर जुळून आली होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें