पवित्र प्रेम

कथा * सुनीता माहेश्वरी

रूपा मॅडम, तुम्ही खूप छान आहात. तुमचे मन फार सुंदर आहे. तुमच्यासारखीच हिंमत आम्हा सर्वांमध्ये असती तर किती बरे झाले असते ना?’’ रूपाची मोलकरीण नीना मोठया आदराने म्हणाली आणि कॉफीचा कप रूपाला देऊन आपल्या घरी निघून गेली.

रूपाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. मागील २ वर्षांपासून ती व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घेत होती. या क्षेत्रात तिने अभूतपूर्व यश मिळवले होते. तिच्या केंद्राची कीर्ती दूरवर पसरली होती. २ वर्षांतच तिने आपल्या वागण्यातून, मेहनतीतून, कौशल्यातून, आत्मविश्वासाने आणि आत्मीयतेने समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त केले होते. तिचे गुण आणि मनाच्या सौंदर्यापुढे तिची कुरूपता खुजी ठरली होती. अनेक विषम परिस्थितीत तपश्चर्या करून तिने आपल्या व्यक्तिमत्त्वाला सोन्यासारखी झळाळी दिली होती, कारण तिच्यासोबत प्रेमाची अफाट शक्ती होती.

त्या दिवशी नीना गेल्यावर रूपा घरात एकटीच होती. तिचा पती विशाल आणि वकील असलेले सासरे प्रमोद खटल्याच्या सुनावणीसाठी गेले होते. हातात कॉफीचा कप घेऊन सोफ्यावर बसलेल्या रूपाला तिच्या आयुष्यातील तो काळोखा काळ आठवला. तो १-१ क्षण तिच्या डोळयांसमोर उभा राहिला.

तारुण्यातील ते दिवस रूपाला आठवले जेव्हा अचानक एके दिवशी सामसूम रस्त्यावर रोहित तिचा रस्ता अडवत म्हणाला, ‘‘माझ्या प्रिये, तू दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाहीस, तू फक्त माझा आहेस.’’

रोहितचा वाईट हेतू पाहून रूपा भीतीने थरथर कापू लागली. कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत पळतच घरी पोहोचली. तिला धाप लागली होती. तिची आई गीताने तिला जवळ घेतले. रूपा थोडी शांत झाल्यावर आईने विचारले, ‘‘काय झाले बाळा?’’

रूपाने रोहितबद्दल सर्व सांगितले. रोहितच्या वागण्यामुळे ती इतकी घाबरली होती की, आता तिला महाविद्यालयात जायचीही इच्छा होत नव्हती. जेव्हा ती एकटी बसायची तेव्हा रोहितचे उतावीळपणे पाहाणारे डोळे आणि अश्लील कृत्य तिला घाबरवायचे.

काही दिवसांनी रूपा कसाबसा धीर एकवटून महाविद्यालयात जाऊ लागली, पण रोहित रोज काहीतरी बोलून तिला त्रास द्यायचा. रूपाने त्याला पोलिसांची धमकी दिली तेव्हा तो म्हणाला, ‘‘पोलीस माझे काहीच बिघडवू शकणार नाहीत. तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला जगू देणार नाही.’’

रूपाने रोहितबद्दल सर्व काही तिच्या प्राचार्यांनाही सांगितले, पण प्रकरण महाविद्यालयाच्या बाहेरचे असल्याने त्यांनी विशेष लक्ष दिले नाही. रूपाला तिच्या वडिलांची खूप आठवण यायची. तिला वाटायचे की, जर वडील हयात असते तर तिला कोणीही असा त्रास देऊ शकला नसता.

रूपा आणि तिच्या आईला शांतपणे जगणे कठीण होत होते. अनेक अडचणींचा सामना करून रूपाने एमए (मानसशास्त्र)ची अंतिम परीक्षा दिली होती.

एके दिवशी आई गीताने तिला लग्नासाठी विचारत सांगितले, ‘‘रूपा, माझ्या मैत्रिणींचा मुलगा विशाल चंदिगडला आहे. तो अभियंता आहे. खूप समजूतदार आहे. मी त्याचे स्थळ तुझ्यासाठी विचारू का?’’

रूपाने लगेच होकार दिला. तिलाही त्या गुंड रोहितपासून सुटका हवी होती. लग्नाची बोलणी झाली आणि लग्न ठरलेही.

लग्नाचे गोड क्षण आठवताच रूपाच्या डोळयांत चमक आली. तिने कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि सोफ्यावर झोपली. जुन्या आठवणी आकाशात उंच भरारी घेत होती.

रूपा आणि विशालचे लग्न चंदिगडमध्ये मोठया थाटामाटात पार पडले. विशालसारख्या हुशार, देखण्या, समजूतदार आणि प्रेमळ तरुणाचा सहवास लाभल्याने रूपा खूप आनंदी होती. जणू तिला आयुष्यातील सर्व सुख मिळाले होते.

रूपा हळूहळू तिच्या नवीन प्रेमळ आयुष्यात रमून गेली. सासरच्यांनाही ती खूप प्रिय होती. घरच्या सर्व जबाबदाऱ्या तिने उत्तम प्रकारे पेलल्या होत्या. तिच्या रूपाचे आणि गुणांचे सर्वच चाहते झाले होते.

रूपाने विशालला रोहितबद्दल सर्व सांगितले होते. विशाल तिला समजावत म्हणाला, ‘‘तू घाबरू नकोस रूपा, असे काही मूर्ख असतात. तू त्याला विसर. आता मी तुझ्यासोबत आहे.’’

लग्नाला ३ वर्षे झाली होती. दरम्यान, अनेक वेळा रूपा आणि विशाल चंदिगडहून लखनऊला गेले होते, पण रोहित कधीच त्यांच्या समोर आला नाही. हळूहळू रूपा त्याला विसरली. तिला आयुष्य खूप सुंदर वाटू लागले होते.

एके दिवशी रूपा पती विशालसोबत लखनऊच्या बाजारातून परतत होती. तेवढयात अचानक रोहितने तिच्या सुंदर चेहऱ्यावर अॅसिड फेकत म्हटले, ‘‘आता दाखव विशालला तुझे हे रूप.’’

रूपाचा सुंदर चेहरा क्षणार्धात जळून कुरूप झाला. रूपाचे रूप कुरूप होताच तिच्या सुंदर चेहऱ्यावर अॅसिड फेकणारा रोहित जिंकल्याप्रमाणे हसू लागला.

हे सर्व पाहून विशालला धक्का बसला. त्याने लगेचच पोलिसांना फोन करून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. काही वेळात लोक जमले. रोहितच्या हातात अॅसिडची बाटली होती. त्यामुळे भीतीने त्याच्या जवळ कोणी जात नव्हते. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याला पकडले.

विशालने रूपाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.

औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर रूपावर उपचार सुरू झाले. तिच्या दोन्ही डोळयांच्या बाहुल्या दिसत नव्हत्या. चेहरा इतका खराब झाला होता की, डॉक्टरांनी विशाललाही तिला पाहू दिले नाही. रूपाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. २ दिवसांनी रूपाची आई गीता आणि विशालला रूपाला भेटण्याची परवानगी मिळाली तेव्हा तिला पाहून आई किंचाळली. अॅसिड फेकण्याचा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या रोहितबद्दल तिच्या मनात संतापाची आग धगधगू लागली.

तब्बल अडीच महिन्यांनंतर रूपाला रुग्णालयातून घरी जायची परवानगी मिळाली, पण उपचार संपले नव्हते. तिला ना दृष्टी होती ना रूप. तिच्यावर आणखी अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

विशाल रूपाला घेऊन चंदिगडला परतला. तिथे तिच्या डोळयांवर आणि चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्त्रिया झाल्या.

हळूहळू तिची दृष्टी परत आली. या घटनेनंतर रूपाने पहिल्यांदा जग पाहिले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही, मात्र स्वत:चा चेहरा पाहून ती किंचाळली. स्वत:चे भूत आरशात पहिल्यासारखे तिला वाटले. तिने विशालला मिठी मारली आणि मोठयाने ओरडली, ‘‘विशाल, या कुरूप चेहऱ्याने मी तुझे आयुष्य खराब करू शकत नाही. मला जगायचे नाही. माझ्यावर इतके प्रेम करू नकोस.’’

विशालचे डोळे पाणावणार होते, पण त्याने कसेबसे अश्रू रोखले. रूपाला त्याने प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला, ‘‘रूपा, तू माझी धाडसी पत्नी आहेस. तू माझे जीवन आहेस. तुझ्याशिवाय माझे अस्तित्व नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, फक्त तुझ्या रूपावर नाही. तू अशी हरून गेलीस तर माझे काय होईल?’’

आपल्या कुरूप चेहऱ्यावर विशालच्या ओठांचा स्पर्श होताच तिला अधिकच रडू आले. तिचे हुंदके थांबत नव्हते. विशालच्या निस्वार्थी प्रेमात आकंठ बुडून ती आपल्या कुरूपतेला दोष देत होती. अॅसिडमुळे केवळ तिचा चेहराच नाही तर विशालचा आनंदही जळून खाक झाला होता.

आपला भीतीदायक चेहरा पाहून रूपा दिवसेंदिवस अधिकच निराश होत होती. एवढी कुरूपता, विद्रूपता पाहून तिच्या मनाला खूप वेदना होत होत्या. जेव्हा ती लोकांना तिच्याकडे टक लावून बघताना पाहायची तेव्हा तिला असे वाटायचे की जणू सर्वच तिची कुरूपता पाहून घाबरले आहेत. प्रत्येक नजर तिचे मन हेलावून टाकत होती.

एके दिवशी रूपा संतापून  म्हणाली, ‘‘विशाल, माझ्यासारख्या कुरूप मुलीसाठी तुझे आयुष्य का वाया घालवतोस? तू पुन्हा लग्न का करत नाहीस? तुझा आनंद माझ्या या कुरूपतेवर वाया घालवू नकोस. तू मला घटस्फोट दे.’’

विशाल प्रेमाने म्हणाला, ‘‘रूपा, मी लग्नाचे सुंदर बंधन तोडण्यासाठी बांधले नाही. पती-पत्नीचे मिलन म्हणजे दोन हृदयांचे मिलन असते. एखादी दुर्घटना आपल्याला वेगळे करू शकेल का? माझ्यासोबत असे काही घडले असते तर तू मला घटस्फोट दिला असतास का?’’

रूपाने विशालच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळयांतून प्रेमाने अश्रू वाहू लागले. विशालचा त्याग आणि प्रेम पाहून तिचे मन धन्य झाले.

चंदिगडमध्ये रूपावर उपचार सुरू होते. अॅसिडने जळलेल्या त्वचेसाठीच्या प्रदिर्घ काळ चालणाऱ्या महागड्या उपचारांमुळे विशालच्या आर्थिक स्थितीवर आणि त्याच्या कामावरही परिणाम होत होता, पण त्याने रूपाला कधीच काही जाणवू दिले नाही. एका जबाबदार पतीप्रमाणे तो आपले कर्तव्य चोख बजावत होता.

विशालचे वडील प्रमोद हे प्रसिद्ध वकील होते. रूपाच्या न्यायालयीन प्रक्रियेच्या कामकाजात ते रात्रंदिवस गुंतले होते. त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायालाच हवी, असा निर्धार त्यांनी केला होता. याशिवाय उपचार आदींसाठी शासनाकडून मदत     मिळावी यासाठीही ते प्रयत्नशील होते.

अचानक रूपाला तिच्या नातेवाईकांची कडवट बोलणी आठवली. एके दिवशी एक नातेवाईक रूपाला भेटायला आला. तो रूपाला भेटला आणि निघताना      विशालला म्हणाला, ‘‘तू हीची जशी सेवा करत आहेस त्यासाठी तुझ्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. आजकालच्या मुली एकावर प्रेम करतात तर दुसऱ्याशी लग्न करतात. तुझ्यासारख्या पतींना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

जन्मपत्रिका पाहून आणि गुणमिलन करून तुझे लग्न झाले असते, तर ही दुर्घटना टळली असती. माझा सल्ला ऐक आणि दुसरे लग्न कर. या कुरूपतेचा भार किती काळ सहन करणार?’’

विशालचे वडील प्रमोद हे सर्व ऐकत होते. ते तावातावाने म्हणाले, ‘‘भाऊ, तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न पत्रिका पाहूनच केले होते ना? मग काय झाले? तुम्हाला आठवतेय ना? तुमची सून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हा सर्वांना सोडून माहेरी निघून गेली. जन्मपत्रिका पाहून आणि गुणमिलन करून तुम्ही कोणता गड जिंकलात? आमच्या निष्पाप सुनेवर आरोप करण्यापूर्वी आधी तुम्ही स्वत:च्या घरात डोकावून पाहायला हवे होते.’’

त्या दिवशी नातेवाइकाचे बोलणे ऐकून रूपाला पुन्हा कोणीतरी तिच्यावर कडवटपणाचे अॅसिड फेकल्यासारखे वाटले. तिचे मन प्रचंड दुखावले गेले. चेहरा लपवून ती रडू लागली.

विशाल रूपाचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘तू काळजी करू नकोस रूपा. मी तुझा नवरा आहे आणि तुझ्यासोबत आहे. कुणी असे निरर्थक बोलतो तेव्हा वाटते की, त्याचे तोंड फोडून टाकावे, पण हा यावरचा उपाय नाही… जोपर्यंत महिलांना समाजात मानाचे स्थान मिळत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे. अशा संकुचित वृत्तीच्या लोकांची विचारसरणी बदलायला हवी.’’

रूपा विशालच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होती.

विशाल तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, ‘‘माझ्या रूपाने पुन्हा हसायला शिकावे अशी माझी इच्छा आहे. स्वत:ला पुन्हा पुन्हा कुरूप म्हणणे थांबव. रूपा, माझ्यासाठी तू पूर्वीइतकीच आजही सुंदर आहेस. तुझे मन किती सुंदर आणि पवित्र आहे हे मला माहीत आहे,’’ असे प्रेमाने सांगत विशालने रूपाला ज्यूस देऊन झोपायला लावले.

प्रत्येक दिवस एक नवीन दिवस ठरत होता. काही जखमा कोरडया पडायच्या तर काहींच्या टोचून बोलण्यामुळे नव्या जखमा मनाला पोखरायच्या. विशालने हळूहळू रूपाचे मन प्राणायामाकडे वळवले. तो तिला नेहमी सांगायचा की, तुझ्या मनाचा आवाज ऐक, ते खूप सुंदर आहे. रूपा, तुला अशा गुन्हेगारांविरुद्ध लढायचे आहे. तुझ्यात हिंमत असायला हवी. तू सुंदर आहेस. शक्तिशाली हो, मानसशास्त्राची जाणकार आहेस. तुझ्या आत अनंत शक्ती दडलेल्या आहेत. तू हार पत्करू शकत नाहीस. मनात आशा निर्माण करून आणि विश्वास जागवून तुला समाजातील वाईट शक्तींचा नाश करायचा आहे.

दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रियाही सुरू होती. विशाल आणि त्याचे वडील तारखेला न्यायालयात जात असत. एक वर्षानंतर जी तारीख मिळाली तेव्हा विशाल त्याचे आई-वडील आणि रूपासोबत न्यायालयात पोहोचला होता. गुन्हेगार रोहित आधीपासूनच तेथे होता. रूपाला आधार देऊन ज्या प्रेम आणि सन्मानाने विशाल तिला न्यायालयात घेऊन आला ते पाहून रोहितचा चांगलाच हिरमोड झाला. इतक्या कुरूप मुलींवरही कोणी पती प्रेम करेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.

विशालने रूपाचा आनंद हिरावून घेणाऱ्या रोहितकडे तिरस्काराने पाहिले आणि म्हणाला, ‘‘तू आमच्यासोबत जे केलेस त्याची शिक्षा तुला लवकरच मिळेल. माझ्या मते तू जगातील सर्वात कुरूप व्यक्ती आहेस… जगात तू कोणालाच आवडणार नाहीस, याउलट रूपा या अवस्थेतही सगळयांना प्रिय आहे. ती नेहमीच सुंदर होती आणि सुंदर राहील.’’

त्या दिवशी रूपाही रणरागिणी झाली होती. तिच्या डोळयांत त्या गुन्हेगाराबद्दलच्या द्वेषाबरोबरच रागाच्या ज्वाळाही धगधगत होत्या. ती कसाबसा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होती.

काही वेळातच विशाल आणि प्रमोद न्यायालयातून घरी परतले. ते खूप आनंदी होते, कारण रूपा जिंकली होती. त्या गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

वेडेपणा

कथा * कृष्णकुमार

हात-तोंड धुऊन झाल्यावर राजीव कल्पनासोबत जेवायला बसला, तेवढयात मोलकरीण बीना आत आली आणि म्हणाली, ‘‘साहेब, बाहेर एक गृहस्थ उभे आहेत, ते स्वत:ला बाईसाहेबांच्या ओळखीचे असल्याचे सांगतात.’’

‘‘तू त्याला सन्मानपूर्वक आता घेऊन का नाही आलीस? ही काय विचारायची गोष्ट होती का?’’ राजीवने ताटात भाजी घेत विचारले आणि कल्पनाकडे पाहिले.

कल्पनाला आश्चर्य वाटले. अंग थरथरल्यासारखे तिला वाटले. न कळवता अचानक कोण आले, असा प्रश्न तिला पडला.

‘‘नमस्कार,’’ पाहुण्याने असे म्हणताच कल्पना गोंधळली. ही व्यक्ती कधी आपल्या समोर येऊन उभी राहील, अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

मंद स्मित करत राजीव कल्पनाच्या चेहऱ्यावरचे विविध भाव काळजीपूर्वक न्याहाळत होता. घरी आलेला पाहुणा कल्पनाच्या परिचयातला आहे, एवढेच त्याच्यासाठी पुरेसे होते. तो सोफ्यावरून उठत उत्साहाने पुढे गेला, त्याने पाहुण्याशी हस्तांदोलन केले आणि त्याला सोफ्यावर आपल्या जवळच बसायला सांगत म्हणाला, ‘‘ये, तुझे स्वागत आहे.’’

‘‘धन्यवाद,’’ पाहुणा बसत म्हणाला.

कल्पना अजूनही त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहात होती.

तो उत्साही स्वरात म्हणाला, ‘‘कल्पना, हे काय ओळख करून देण्याऐवजी, मी भूत असल्यासारखे तू माझ्याकडे पाहात आहेस.’’

कल्पनाने ताबडतोब स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि हसण्याचा प्रयत्न करत ती राजीवला म्हणाली, ‘‘राजीव, हा माझा बालपणीचा मित्र आणि महाविद्यालयातील सोबती कमल आहे.’’

‘‘तुला भेटून आनंद झाला,’’ राजीव हसत कमलला म्हणाला.

‘‘आणि हा माझा वकील पती राजीव आहे,’’ कल्पना कमलला म्हणाली.

‘‘ओळखतो मी,’’ कमल हसत म्हणाला.

‘‘तू याला ओळखतोस, पण कसं?’’ कल्पनाच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले, तिचा चेहरा फिका पडला.

‘‘अरे, म्हणजे काय? हे काय विचारतेस?’’ कमल हसत म्हणाला, ‘‘विसरलीस का? तू मला पाठवलेल्या तुझ्या लग्न पत्रिकेवर तुमची नावं होती.’’

‘‘अरे, मी विसरले,’’ कल्पनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

‘‘विसरणे ही तुझी जुनी सवय आहे, हे मला चांगलं माहीत आहे,’’ कमल म्हणाला आणि कल्पनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तो हसत पुढे म्हणाला, ‘‘चहामध्ये साखर किंवा भाजीत मीठ आणि मिरपूड घालायला विसरल्याबद्दल काकूंकडून तुला शिव्या पडायच्या. मित्रांसोबत गप्पा मारताना वर्गात शिकवलेले तू विसरायचीस आणि नंतर घरी आल्यावर माझे डोकं खायचीस.’’

कल्पनाला कमलचा हा विनोद अजिबात आवडला नाही. त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा तिच्यावर खोलवर परिणाम होत होता, पण प्रत्यक्षात ती राजीवसमोर तिच्या चेहरऱ्यावरचे हावभाव नियंत्रित करण्याचा अपयशी प्रयत्न करत होती. आपल्याला आयुष्यात एवढी मोठी परीक्षा द्यावी लागेल, याची कल्पनाही तिने कधी केली नव्हती.

‘‘कल्पना, असे वाटतेय की, कमलला तुझ्या सवयी चांगल्याच माहीत आहेत. म्हणूनच तू त्याला जेवणाचे आमंत्रण द्यायला विसरली होतीस का?’’ राजीवने हसत विचारले.

‘‘तू हिच्या बालपणीचा मित्र आहेस, त्यामुळे तू इथेच राहा, तुझी बॅग कुठे आहे?’’

कमल म्हणाला, ‘‘बॅग बाहेर टॅक्सीमध्येच आहे. मी टॅक्सीचे भाडे देऊन बॅग घेऊन येतो.’’

दोघे न जाणो का, पण कमलला चिडवायची संधी शोधत होते.

कल्पनाला तिने केलेल्या त्या चुकीची खूप लाज वाटत होती. सोबतच आपल्या जीवावर बेतले जात असताना राजीव त्याला घरी राहण्यास सांगत असल्यामुळे तिला राजीवचा राग आला. ते दोघे आपल्याला चिडवण्याची संधी शोधत आहेत. मनातील चिडचिड, भीती आणि लाजेची संमिश्र भावना दूर व्हावी म्हणून ती तिथून गुपचूप उठली आणि कमलसाठी खायला आणायला स्वयंपाकघरात गेली.

‘‘कंपनीच्या कामानिमित्त मी दिल्लीला आलो होतो. अचानक मला आठवलं की कल्पनाही दिल्लीत राहाते. त्यामुळेच मी इथे आलो,’’ कमल जरा जोरात म्हणाला आणि टॅक्सीचे पैसे द्यायला गेला.

खाण्याचे पदार्थ टेबलावर ठेवताना कमलने राजीवला सांगितलेले हे शब्द ऐकताच कल्पना अचानक थांबली आणि तिचे घाबरलेले हृदय आणखी वेगाने धडधडू लागले.

ती खूप अस्वस्थ झाली. कमलला येथे येण्याची काय गरज होती? त्याला दिल्लीत राहायला कितीतरी सुंदर जागा मिळू शकल्या असत्या. मी कमलचे काय बिघडवले होते की, तो माझ्या शांत जीवनात वादळ बनून आला आहे. अनेक प्रयत्नांनंतर मी ती गोष्ट विसरण्यात यशस्वी झाले होते. आता मला पुन्हा त्याच वेदनादायक परिस्थितीतून जावे लागेल. कमलमुळे राजीवला कधीही माझ्या पूर्वयुष्याची माहिती मिळू शकते. मग त्याच्या हृदयात आज जशी मला जागा आहे तशीच जागा मिळू शकेल का? माझे सुखी वैवाहिक आयुष्य विषारी भूतकाळापासून सुरक्षित राहील का?

तेवढयात कल्पनाला राजीवचा आवाज आला, कमल आला होता. राजीव म्हणत होता, ‘‘तू खूप छान केलेस. या निमित्ताने तुला भेटण्याची संधी मिळाली, नाहीतर आपण कधी भेटलो असतो की नाही कोणास ठाऊक, पण तू आमच्या लग्नाला का आला नाहीस?’’

‘‘तुमचं लग्न जूनमध्ये झालं होतं आणि त्या दिवसांत महाविद्यालय बंद असल्यामुळे मी माझ्या घरी बाजपूरला गेलो होतो. कल्पनाने मला लग्नाचे आमंत्रण पाठवले होते, पण माझ्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाल्यामुळे मी लग्नाला येऊ शकलो नाही,’’ कमलने उत्तरादाखल सांगितले.

‘‘माफ कर, हा विषय काढून मी उगाचच तुझे मन दुखावले,’’ राजीव खेदाच्या स्वरात म्हणाला.

‘‘काही हरकत नाही, माझ्या मते, निधन झालेल्याच्या आठवणीत अश्रू ढाळणे म्हणजे भावूकतेशिवाय दुसरे काही नाही,’’ कमल पूर्वीप्रमाणेच सहजतेने म्हणाला.

‘‘चला जेवायला, जेवण थंड होईल,’’ असे सांगत कल्पनाने त्यांच्या संभाषणात व्यत्यय आणला.

कल्पनाला पाहाताच राजीवच्या ओठांवर पुन्हा खोडकर हसू उमटले.

‘‘अरे वा, स्वयंपाकात पारंगत झालेली दिसतेस. ही सर्व राजीवची कृपा दिसते,’’ कमलने मटर पुलावचा पहिला घास खात म्हटलं,

‘‘नाही भावा, मी वकील आहे, आचारी नाही,’’ राजीव हसत म्हणाला.

हे ऐकून कमल तर हसलाच, पण घाबरलेली आणि अपराधी भावनेने घेरलेली कल्पनाही क्षणभर सगळं विसरून हसली, पण पुढच्याच क्षणी ती पुन्हा गंभीर झाली, जणू हसून तिने गुन्हा केला होता.

जेवणातील प्रत्येक पदार्थाचा पहिला घास घेताच कमल त्या पदार्थाच्या चवीचे कौतुक करायला विसरला नाही. कल्पनाला आजही आठवतं होतं की, जेव्हा कधी त्याला चविष्ट खायला मिळायचं तेव्हा तो स्तुती करायचाच. विचारात हरवलेल्या कल्पनाला कमलला धन्यवाद म्हणायचेही सुचले नाही. जेवण झाल्यावर राजीव आणि कमल बाहेर बाल्कनीत ठेवलेल्या खुर्च्यांवर बसले. बिनाला कमलच्या गेस्ट रूममध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिल्यावर कल्पनाही बाहेर आली. तिघांनी तिथेच कॉफी घेतली. दिवाणखान्यात रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरू होत्या. राजीव कल्पनाला सतत चिडवत होता. संधी मिळाल्यावर कमलही मागे राहिला नाही. कल्पनाला समजू शकले नाही की, ते दोघे तिला असा त्रास का देत आहेत?

औपचारिकता आणि सभ्यतेच्या दडपणाखाली तिला त्या दोघांबरोबर बसून राहण्यास भाग पाडले. कमलला त्याच्या खोलीत सोडल्यानंतर, राजीवसोबत पायऱ्या उतरताना, कल्पनाला तिच्या मनावरचे ओझे काही काळ हलके झाल्यासारखे वाटले, पण थोडया वेळाने त्याचे विचार तिला पुन्हा सतावू लागले.

ती ज्या खोलीत झोपली होती, त्याच्या वरच्या खोलीत एक पुरुष आहे, जो तिचे सुखी, शांत आणि हसतमुख वैवाहिक आयुष्य कधीही उद्धवस्त करू शकतो. या भावनेखाली दबलेली कल्पना राजीवजवळ झोपण्याच्या अयशस्वी प्रयत्नात पडून राहिली. वास्तविक, राजीवसोबत लग्न करण्यापूर्वी कल्पनाचा कमलसोबत लग्न करण्याचा विचार होता. दोघेही शेजारी असल्यामुळे सतत भेटत असले तरी त्यांच्यात कधी प्रेमाच्या गोष्टी झाल्या नव्हत्या. कमलने कधी तिचा हातही धरला नव्हता. पण, तिची मस्करी करणे, वेणी ओढणे, असे सुरू असायचे. तरीही त्यांच्यात मैत्री होती, प्रेम नाही. तो तिच्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या ‘आय लव्ह यू’ मेसेजला ‘तू ग्रेट आहेस, सुंदर आहेस, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस,’ अशी उडवाउडवीची उत्तरे देत असे.

कल्पनाच्या मैत्रिणी तिला अनेकदा सांगायच्या की, त्याला धरून ठेव नाहीतर तो उडून जाईल किंवा कोणीतरी त्याला उडवून नेईल. कल्पनालाही त्याच्या सारख्या देखण्या मुलाला कोण सोडेल, असा प्रश्न पडला होता, त्यामुळेच तिने एक दिवस एक धाडसी गोष्ट करण्याचा बेत आखला.

कमलचे घर जवळच होते, त्याचे पालक घरी कधी असतात आणि कधी नाही, हे तिला माहीत होते. एके दिवशी ते बाहेर गेले होते. तो घरी एकटाच होता. त्यावेळी कल्पनाने मागचा दरवाजा गुपचूप उघडून ठेवला. रात्री सगळे झोपलेले असताना ती उठली. तिने खूप सेक्सी अंडरवियर घातले होते आणि स्वत:ला शालने झाकले होते. रात्री १२ वाजता ती तिच्या घरातून निघाली आणि गुपचूप त्याच्या घराच्या मागच्या दाराने त्याच्या घरात शिरली. कमलच्या पलंगाकडे जाऊन तिने अंगावरची शाल काढली. कमल काळया पायजम्यात बनियन न घालता झोपला होता. तिने त्याला स्वत:च्या मिठीत ओढले. कमलला काय चालले आहे, ते समजण्याआधीच तिने त्याच्या मोबाईल मधून ४-५ फोटो काढले. त्यानंतर एक व्हिडीओही सुरू केला. तिला कमलवरचे आपले प्रेम व्यक्त करायचे होते, त्याला आपले सर्वस्व द्यायचे होते.

कमलने स्वत:ला सावरत लॅम्प लावला आणि कल्पनाला त्या अवस्थेत पाहून ओरडला. ‘‘शुद्धीवर ये, कल्पना… हे काय करतेस?’’

‘‘शुद्धीत तर तू नाहीस लाडक्या, मी इतके दिवस याच संधीच्या शोधात होते. तू तर मला थोडेही महत्त्व देत नाहीस. त्यामुळे माझ्यापुढे हा एकच मार्ग उरला होता, कमल,’’ कल्पना बेधुंद होत म्हणाली.

तिच्या कानाखाली मारून तिला धक्का देत कमल म्हणाला, ‘‘हा तुझा वेडेपणा आहे कल्पना. आपण चांगले मित्र असू शकतो, पण प्रेमी नाही. आपले लग्न होऊ शकत नाही, कारण तुझे आई-वडील माझ्यासारख्या कमी जातीच्या मुलाशी तुला लग्न करू देणार नाहीत. मी आपल्या मैत्रीवर तुझ्या या वेडेपणाची सावलीसुद्धा पडू देणार नाही. तू माझा जिवलग मैत्रीण आहेस आणि कायम राहशील, पण आता घरी जा, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर कल्पना. आपण बालपणीचे मित्र आहोत, आयुष्यभर तसेच राहू.’’

तितक्यात राजीव, न जाणो कोणता विचार करून हसला? कल्पनामध्ये अचानक झालेला बदल त्याच्यापासून लपला नव्हता. कमल आल्यापासून कल्पना काहीशी दबलेली, चिडलेली आणि घाबरलेली दिसत होती, असे त्याला वाटत होते, जणू काही तिला कमलचे येणे आवडले नव्हते किंवा त्याच्याकडून काही विशेष धोका होण्याची शक्यता होती.

त्याने आश्चर्य वाटल्यासारखे दाखवत कल्पनाला विचारले, ‘‘अगं, तू अजून झोपली नाहीस?’’

‘‘मला झोप का येत नाही, ते कळत नाही,’’ कल्पना त्याच्याकडे वळून म्हणाली, ‘‘लाइट बंद कर.’’

राजीवने हात पुढे केला आणि लाईट बंद करून नाईट बल्ब लावला. काही वेळ शांत राहिल्यावर तो पुन्हा म्हणाला, ‘‘कल्पना, कमल आल्यापासून तू जरा उदास, शांत आणि घाबरलेली दिसतेस. तुझा खेळकरपणा कुठे तरी नाहीसा झालाय. तुला त्याचे येणे आवडले नाही का?’’

‘‘नाही, तुला हे कोणी सांगितलं?’’ स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाही कल्पनाला धक्का बसला.

‘‘कमलला पाहताच तुझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग, डोळयातले आश्चर्य आणि पापण्या न लवता एकटक पाहाणे, ही सर्व लक्षणे याचेच द्योतक नाहीत का?’’ राजीवने विचारले.

‘‘कोणताही जुना ओळखीचा किंवा एखादा मित्र अचानक समोर आल्यावर असेच वाटणार ना?’’

‘‘बरं, जाऊ दे, मी काही बोलू का?’’ राजीव सहज म्हणाला, खरं तर कल्पनाला असा मुद्दा मांडताना पाहून त्याच्यातील खोडसाळपणा पुन्हा जागा झाला होता.

‘‘सांग,’’ कल्पना म्हणाली.

‘‘कमल माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे, शिवाय तुझं बालपण आणि महाविद्यालयीन जीवनही त्याच्यासोबत गेलं आहे.’’

कल्पनाला त्याच्या बोलण्यामागचा अर्थ समजला नाही. त्यामुळे ती गप्प राहिली.

‘‘माझ्यापेक्षा तुला आणि कमलचा जोडा जास्त शोभला असता.’’

कल्पना स्तब्ध झाली. आश्चर्य आणि भीतीमुळे हृदयाची धडधड वाढलेली कल्पना डोळे विस्फारून राजीवकडे बघतच राहिली. नाईट बल्ब राजीवच्या मागे असल्याने, अंधारात लपलेल्या त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू न शकल्यामुळे तिला योग्य अंदाज लावता येत नव्हता. याला पतीचा खेळकरपणा समजायचे की स्पष्टवक्तेपणा? की मग आपल्या आणि कमलच्या भूतकाळातील नातेसंबंधांवरचा राजीवचा टोमणा, हेच तिला समजत नव्हते. पुन्हा एकदा ती भीती, संशय आणि अपराधीपणाच्या विचित्र अवस्थेत अडकली होती. राजीवला तिचे आणि कमलचे पूर्वीचे संबंध समजले असतील तर पुढे काय होईल, या नुसत्या विचारानेही तिच्या अंगावर काटा आला. तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले.

‘‘नाराज झालीस का?’’ राजीवने हसत विचारले. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या बल्बच्या अंधुक प्रकाशात तिच्या डोळयात पाहाण्याचा तो प्रयत्न करू लागला.

‘‘नाही,’’ कल्पना स्वत:ची नजर चोरत बळजबरीने हसत म्हणाली.

‘‘ठीक आहे, झोप आता. रात्र बरीच झाली आहे.’’

‘‘हो,’’ असं म्हणत राजीवने पापण्या मिटल्या.

तो कधी गाढ झोपी गेला ते कल्पनाला समजलं नाही. थकलेल्या कल्पनालाही झोपावेसे वाटत होते, पण झोप तिच्या डोळयांपासून कोसो दूर होती. झोपेऐवजी भूतकाळातील आठवणी बंद पापण्यांमधून डोकावत होत्या.

कल्पना ही मध्यमवर्गीय कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. वडील कृष्णगोपाल यांचे खेळण्यांचे दुकान होते. त्यांचे शेजारी घनश्यामलाल हे कमलचे सख्खे मामा होते. घनश्यामलाल यांच्या शहरात दुधाच्या अनेक डेअरी होत्या. त्यांच्याकडे खूप चांगले काम होते. ते खूप शिकलेले होते.

कल्पना कमलला लहानपणापासूनच ओळखत होती. दरवर्षी उन्हाळयाची सुट्टी नैनीतालला घालवण्याच्या निमित्ताने कमलचे कुटुंब घनश्यामलालकडे येऊन राहायचे. दोन्ही घरांना एकच अंगण होते. ती, कमल आणि इतर दोन भाऊ-बहिणी एकत्र लपाछपी खेळत. ती त्यांच्यासोबतच खेळायला बसायची. दिवस-रात्र कधीही त्यांच्या मोठया खाटेवर जाऊन बसायची, जिथे कमल आणि तिचे लहान भाऊ-बहीण झोपायचे. ती न लाजता त्यांच्यासोबत जाऊन झोपायची.

काही दिवसांनंतर कमलने कल्पनासोबतच महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केले. कमलच्या मामा-मामीला मुलं नसल्यामुळे त्यांनी कमलला हॉस्टेलमध्ये न  राहता आपल्या जवळच राहण्यासाठी तयार केले. दोघे एकत्र महाविद्यालयात जायचे. एकत्र घरी यायचे. त्याचे वडील आणि कामलच्या मामांचे घरोब्याचे संबंध असल्यामुळे महाविद्यालय किंवा घरी कमल आणि कल्पना एकमेकांना बिनधास्त भेटू शकत होते.

अनेकदा कल्पनाची आई तिच्या वडिलांना दबक्या स्वरात म्हणायची, ‘‘बघा, दोघांची जोडी किती छान दिसते, पण…’’

कल्पना त्यावेळी जाणती झाली होती. आईच्या या विधानाने तिच्या मनातील कमलबद्दलचा आपलेपणा आणखीनच दृढ होत गेला, कमल आपलाच जीवनसाथी बनेल यावर तिला पूर्ण विश्वास होता, पण तिला आईच्या ‘पण’ असे बोलण्यामागचा अर्थ समजू शकला नव्हता.

बी.ए.ची परीक्षा संपताच, कमल मामा-मामीचा निरोप घेऊन आई-वडिलांच्या घरी गेला. निघताना त्याने तिला वचन दिले की, तो लवकरच आपल्या कुटुंबासह परत येईल. कमल गेल्यानंतर पहिल्यांदाच कमलशिवाय नैनीलालच्या प्रत्येक गोष्टीचं आणि ठिकाणाचं आकर्षण मावळल्यासारखं तिला वाटू लागलं. ती स्वत:ला अस्तित्वहीन समजू लागली होती.

तिसऱ्या दिवशी तिला कमलचे पत्र मिळाले. पत्र वाचताना तिच्या चेहऱ्यावरचे दु:ख वाढत गेले. कमलने लिहिले होते की, आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याचे कुटुंब यावर्षी नैनितालला येऊ शकणार नाही. दिलेले आश्वासन पूर्ण करू न शकल्याची खंतही त्याने व्यक्त केली होती.

ती रडतच घरी आली. दुसऱ्याच दिवशी कमलच्या आजीचे निधन झाल्यामुळे कमल आणि त्याचे आई-वडील बाजपूरला गेल्याचे तिला समजले. कमल पुन्हा परतला नाही, त्याचे मेसेज पूर्वीसारखेच येत राहिले, कल्पनाला माहीत होते की, तिचे साहस कमलच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहे, त्यामुळेच ती शांत होती.

काही दिवसांनी जेव्हा तिच्या आई-वडिलांकडे कल्पनासाठी राजीवचे स्थळ आले तेव्हा त्यांनी लगेच लग्नाला होकार दिला आणि कमलला आमंत्रणही पाठवले. कमलने मेसेजही केला की, तो येईन आणि भेट म्हणून तिला तो मोबाईल देईल, पण तो लग्नाला आला नाही. त्यामुळे कमल आपले ते धाडसी कृत्य सर्वांसमोर आणेल, अशी भीती कल्पनाला सतत वाटत होती. त्याचं अचानक येणं आणि इतकं बिनधास्तपणे तिला भेटणं तिच्यासाठी भीतीदायक होतं.

राजीवने कायद्याची पदवी उत्तीर्ण केल्यानंतर प्रॅक्टिस सुरू केली. दोन्ही घरचे आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांचे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले आणि लग्नादरम्यान ती शांततेची दगडी मूर्ती बनून राहिली. तिने कोणताही आक्षेप घेतला नाही, उलट कमलला हेवा वाटावा म्हणून तिने तिची लग्नपत्रिकाही त्याला पाठवली होती, पण कमल गेलाच नाही. त्याचे पत्र आले होते. त्याने लिहिले होते:

‘‘कल्पना’’

‘‘तुझ्या लग्नाला येऊन मला खूप आनंद झाला असता, पण हृदयविकाराने त्रस्त असलेल्या माझ्या आईच्या आकस्मिक निधनामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही. माझी असहायता समजून घेऊन मी न येण्याबद्दल तू मला माफ कर. माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत असतील.

‘‘कमल’’

पत्रात आधीच्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही, हे पाहून तिने अचानक थंड मनाने विचार केला की, प्रत्यक्षात ती कमलबद्दलच्या गैरसमजाची शिकार झाली आहे का? कमल त्याच्या जागी बरोबर असण्याची शक्यता आहे. त्याने तिला मैत्रिणीपेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही. तिच्या मनात जागृत झालेल्या या विचारांनी त्यावेळी कमलबद्दलचा सर्व द्वेष तिने मनातून काढून टाकला होता. आता कमलविरुद्ध तिची कोणतीही तक्रार नव्हती. औपचारिकता म्हणून तिने कमललां माफी मागणारे पत्रही लिहिले होते.

राजीवच्या सान्निध्यात एक वर्ष कसे निघून गेले ते तिला कळले देखील नाही, पण आज अचानक खूप दिवसांनी कमल तिच्या समोर आला आणि तिच्या मनाच्या शांत तळयात पुन्हा एकदा खळबळ उडाली. तिच्या विचारांच्या लहरींनी वादळी रूप धारण केले होते. तिच्या मनात भीती आणि अपराधीपणाने घर केले होते, जर राजीवला समजले की, तिच्या महाविद्यालयीन दिवसात तिने कमलसोबत एकमेकांचे जीवनसाथी होण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याने मात्र तिचे प्रेम नाकारले होते. त्यामुळे तिला त्याच्या नजरेतून उतरल्यासारखे झाले होते. कदाचित तो व्हिडीओ त्याच्याकडे असेल आणि त्याच्या मोबदल्यात तो पैशांची मागणी करेल. अशा परिस्थितीत तिचे सुखी आणि शांत वैवाहिक जीवन उद्धवस्त होईल आणि ती ते सहन करू शकेल का?

‘‘नाही, असं कधीच घडणार नाही,’’ थरथरत्या ओठांनी ती स्वत:शीच पुटपुटली.

‘‘अगं, तू अजून झोपली नाहीस?’’ अचानक राजीवला जाग आली.

‘‘मला सांग, कमलचे येणे मला आवडले नाही हे तुला कसं समजलं?’’

‘‘जाऊ दे, तुला वाईट वाटेल.’’

‘‘नाही वाईट वाटणार, तू सांग.’’

‘‘कमल माझ्यासाठी अनोळखी नाही. आम्ही दोघे जुने मित्र आहोत.’’

‘‘मग तुला सगळं माहीत आहे का?’’

‘‘हो कल्पना, मला सगळं माहीत आहे. खरं सांगायचं तर आपलं लग्न कमलच्या मध्यस्तीमुळेच झालं आहे,’’ राजीवने आणखी एक खुलासा केला.

‘‘काय?’’ कल्पनाचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले.

‘‘हो, ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा तुझे स्थळ मला आले होते. कमल बाजपूरला होता. आईच्या आजारपणमुळे तो नैनितालला जाऊ शकला नाही. काही दिवसांपूर्वी मी त्याला एक पत्र पाठवले होते, त्यात लिहिले होते, ‘‘मित्रा, तू नैनितालमध्ये शिकतोस. या मुलीबद्दल महिती देशील का? उत्तरादाखल त्याने लिहिले की, ही मुलगी माझ्यासोबतच शिकते. मी तिला खूप चांगले ओळखतो.’’

‘‘तुला फक्त स्तुती ऐकून न पाहताही मला तू आवडली होतीस. त्याने माझ्यापासून काहीही लपवले नाही. तुमच्या बालपणीच्या गोष्टी, तारुण्यातला सहवास, तुझा त्याच्याबद्दलचा गैरसमज, त्याने मला सर्व सविस्तर सांगितले होते,’’ असं म्हणत राजीव कल्पनाला न्याहाळू लागला.

‘‘पण तू आजपर्यंत हे सगळं माझ्यापासून का लपवून ठेवलंस?’’ कल्पनाने विचारले.

‘‘तुला लाजल्यासरखे वाटू नये म्हणून.’’

‘‘आणि आज संध्याकाळी जे नाटक केलंस त्याची काय गरज होती?’’

‘‘अगं,’’ राजीव हसला आणि खूप वेळ हसत राहिला. मग म्हणाला, ‘‘कमल आज दुपारी अचानक माझ्या कार्यालयात आला होता. मग मला वाटलं, थोडी गंमत करावी. मी त्याला गळ घातली की, अचानक त्याने तुझ्या समोर यावं आणि आम्ही दोघे पहिल्यांदाच भेटतोय, असं भासवावं.’’

‘‘तुला असं वाटलं नाही की, तुझी ही मस्करी एखाद्याचा जीव धोक्यात घालेल?’’ चेहऱ्यावर कृत्रिम राग आणत कल्पना म्हणाली.

‘‘प्रिये, मस्करी? ती कुठे रोज केली जाते?’’ राजीव हसत म्हणाला आणि मग त्याने कल्पनाला ओढून घेत मिठी मारली.

कल्पनाच्या डोळयांतून आनंदाश्रूंच्या रूपात भीती आणि अपराधीपणाची भावना वाहू लागली आणि राजीवचा शर्ट भिजवू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव आपल्या अशिलासोबत बसला होता तेव्हा कमलने कल्पनाला एक पाकीट दिले आणि म्हणाला, ‘‘ही तुझी वस्तू मी तुला परत करतोय. ती नष्ट कर. तुझ्या मनात कधीही शंका येऊ नये म्हणून मी ही सांभाळून ठेवली होती. आपण मित्र आहोत आणि कायम राहू आणि ही घे माझ्या लग्नाची पत्रिका. मी आमंत्रण द्यायलाच आलो होतो. तुम्ही दोघे मुंबईत माझ्या लग्नाला या. या व्हिडीओला सोडून शीतलला आपल्याबद्दल सर्व काही माहीत आहे. राजीवने लग्नाला यायला आधीच होकार दिला आहे, पण माझा तुझ्यावर जास्त हक्क आहे, म्हणून ही पत्रिका आणि मिठाई घे,’’ असे म्हणत त्याने कल्पनाच्या कपाळाचे चुंबन घेतले.

कल्पनाला हा क्षण अप्रतिम वाटला, त्या दिवसापासून तिच्या मनावरचे त्या वेडेपणाचे ओझे दूर झाले.

दिखावा

कथा * दिनेश सिंह

आजींच्या चितेला काकांनी अग्नी दिला. काका त्यांच्या दोन मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाले होते. चितेने धडधडत पेट घेतला. गंगेच्या काठावरील जोरदार वाऱ्याने आगीत तेल ओतायचे काम केले. चितेच्या प्रखर आगीमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या माणसांना थंडीच्या मोसमातही उबदार वाटले.

जवळपास ५०-६० माणसांच्या गर्दीत मीदेखील होतो. आजीच्या रुग्णालयात जाण्यापासून ते मरेपर्यंत तिच्यावर केलेले उपचार, तसेच तिला स्मशानभूमीत घेऊन जाताना झालेले सर्व पूर्वापार विधी मी अत्यंत कुतूहलाने पाहात होतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला हे समजत नव्हते की, विधींचे पालन करणे का गरजेचे आहे किंवा त्या न पाळल्याने काय नुकसान होईल? अशा प्रकारचा मृत्यू मी पहिल्यांदाच जवळून पाहिला होता.

आजींच्या तीन जावयांमध्ये मी सर्वात लहान जावई होतो. त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता.

१० डिसेंबरला सकाळी अंघोळ करताना त्या नाहणीघरात पडल्या होत्या. खूप रक्त वाहून गेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मेंदूतील नसा फुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मला जे जमले ते मी केले. माझी पत्नी तिच्या आजीची काळजी घेण्यासाठी रात्रंदिवस रुग्णालयातच राहिली. खरं तर ती माझी आजी नसून माझ्या पत्नीची आजी होती किंबहुना माझ्या पत्नीची आईच होती, कारण माझ्या पत्नीच्या आईचा मृत्यू लवकर झाल्यामुळे आजीनेच तिला सांभाळले होते. माझ्या पत्नीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळेच माझ्या पत्नीचे आणि माझेही पत्नीच्या आजीसोबत चांगले पटत होते.

माझ्या दोन मोठया मेहुण्या, काकाच्या मुली, एकुलती एक सून, काकी, त्यांच्या सर्व मुलांसह दुपारीच रुग्णालयात पोहोचत असत. संध्याकाळपर्यंत सर्वजण आजीसोबत बसण्याऐवजी बाहेर फिरताना दिसायचे. जेव्हा मी तिथे पोहोचायचो तेव्हा मला माझ्या चुलत मेहुण्या कधी चहा, कधी कॉफी पिताना तर कधी बाहेर रस्त्यावर फिरताना दिसत. एकदा विचारल्यावर त्यांनी सांगितलें की, ‘‘इथे खूप थंडी आहे. मुलांना सर्दी होऊ नये म्हणून उन्हात राहाणे खूप गरजेचे आहे.’’

मी प्रश्न केला, ‘‘मग तुम्ही मुलांना इथे का आणता? काहीनी घरीच थांबावे तर काहींनी रात्री यावे.’’

एकजण म्हणाली, ‘‘माझी मुलं माझ्यासोबतच येतील. मी त्यांना कोणाच्या भरोशावर कसे सोडून येऊ? मुलांना रात्री येथे झोपायला लावणे योग्य नाही, कारण त्यांना संसर्ग होऊ शकतो. घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. मला स्वत:ला संसर्गाच्या भीतीने येथे यावेसे वाटत नाही, पण काय करणार? आईने सांगितले आहे, त्यामुळे यावेच लागते. नाही आले तर लोक काय म्हणतील? (जणू ती नातेवाईकांच्या टोमण्यांच्या भीतीने येथे येत होती) तसे तर आजींचा दीप्तीवर खूप विश्वास आहे, आता फक्त दीप्तीनेच त्यांना बघायला हवे.

तिच्या या उत्तराने मी निरुत्तर झालो. त्या दोघी बहिणी आणि दीप्तीची काकू मात्र खूश दिसत होत्या. मी विचार करू लागलो, ‘‘कदाचित मीच मूर्ख आहे जो इथे पडलेलो असतो.’’

पण लगेच मनात दुसरा विचार आला, ‘बहीण आहे. सेवा केली तर बिघडले कुठे? सर्व नालायक असले तरी मी नालायक नाही.’ या आजीमुळेच माझे दीप्तीशी लग्न झाले. काका, मामा तयार नव्हते. आजींनीच पुढाकार घेऊन आमच्या प्रेमविवाहावर शिक्कामोर्तब केले होते. काका-काकूंना दीप्तीचे लग्न कुणा शिक्षकासोबत लावून द्यायचे होते. मी दक्षिण भारतीय होतो, आजींनी माझी जात, माझे कुटुंबीय, कुणाबद्दलच काही विचारले नाही. त्यांचा दीप्तीवर पूर्ण विश्वास होता.

आजीचे वय झाल्यापासून दीप्ती त्यांची सगळी कामं करायची. ती लहानपणापासून ही कामं करत होती, पण माझ्यासोबत एमबीए केल्यानंतर, त्याच एनएनसीमध्ये काम करूनही आजींची छोटी-छोटी कामं दीप्तीकडेच होती. आजींनी मला ते प्रेम दिलं, जे मला कोणाकडून कधीच मिळालं नाही, म्हणून आम्हा दोघांना रुग्णालयात रात्रंदिवस त्यांची सेवा करताना समाधान वाटत होते. आजी, कोणासाठी ओझे कशी ठरू शकते? काका-काकूंचे त्यांनाच माहीत.

आजींच्या एकुलत्या एक सुनेने, बहुधा सासूला हात न लावण्याची शपथ घेतली असावी. ती घरातून निघताना महागडी साडी आणि मॅचिंग ब्लाऊज घालायची. लिपस्टिकसह मेकअप करायची. रुग्णालयात आल्यावर पुन्हा एकदा आरशात मेकअप न्याहाळायची, जेणेकरून तो खराब झाला असेल तर नीट करता येईल. त्या वयातही काकीचा नखरा पाहाण्यासारखा होता. ती माझ्यासोबत फ्लर्टही करायची.

एके दिवशी मी तिला सांगून टाकले की, ‘‘काकी, तुम्ही येथे मेकअप करणे शोभत नाही.’’

ती रागाने म्हणाली, ‘‘तुला काय समजते? येथे अनेक डॉक्टर येतात. त्यातले काही त्यांचे तर काही जावयांचे मित्र आहेत. ते मित्रही आजीला भेटायला येतात. त्यांनी मला साध्या कपडयात बघितले तर काय म्हणतील? तुझ्या काकांची, एका मोठया उद्योगपतीची पत्नी म्हणून मला हे सर्व करावं लागतं. घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे.’’

आजोबांचा एकुलता एक मुलगा आणि आमच्या सख्ख्या एकुलत्या एक काकांना व्यवसायातून सवड मिळायची नाही, पण हो, रोज रात्री एकदा ते येथे हजेरी लावून जायचे. रात्री येथे थांबतो, असे सांगून काही वेळाने दुकानातील नोकराला येथे बसवून जायचे, जो सतत झोपेत असायचा. रात्री ग्लुकोज लावताना मला आजींचा हात धरावा लागला, कारण त्या अनेकदा हात हलवत होत्या. त्यामुळे दीप्ती आणि मी रात्री आळीपाळीने झोपायचो आणि उठायचो.

आजींसाठी ७व्या दिवशी घरी महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू झाला. त्यांना भागवत गीता वाचून दाखवण्यासाठी रुग्णालयात एका पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. एका तासासाठी तो २०० रुपये घेत असे. आजी जेव्हा बऱ्या होत्या तेव्हा त्यांच्याशी कोणी छोटीशी गोष्टही बोलत नसे, पण आता त्यांना भगवत गीतेचे वाचन करुन दाखवले जात होते. जोपर्यंत आजी बऱ्या होत्या, त्यांची कोणालाच काळजी नव्हती, कोणी त्यांना खायला – प्यायला विचारले नाही. त्या घराच्या एका कोपऱ्यात पडून असायच्या.

८व्या दिवशी पहाटेच्या सुमारास आजींचे रुग्णालयातच निधन झाले. काका, काकी, माझ्या चुलत मेहुण्या, त्यांचे पती आले होते. त्या दिवशी त्यांनी मुलांना घरीच ठेवले होते.

येताच सर्वांनी आजींच्या पार्थिवाला मिठी मारली. (त्यांनी याआधी माझ्या पुढयात असे कधीच आजींना जवळ घेतले नव्हते). थोडयाच वेळात संपूर्ण खोली गोंगाट आणि रडण्याच्या आवाजाने भरून गेली. जणू काही एकाचवेळी अनेकांची हत्या करण्यात आली होती. ५ मिनिटांत सगळे शांत झाले. कोणाच्याही चेहऱ्याकडे बघून त्यांनी डोळयांतून एक अश्रूही काढल्याचे दिसत नव्हते. ते संपूर्ण दृश्य मला नाटकाच्या रंगीत तालमीसारखे वाटले. माझे स्वत:चे आई-वडील जिवंत होते आणि दोघेही माझ्यासारखेच त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक होते, त्यामुळे कुणाला असे पाहाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.

आजींचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला, त्यावेळी काका एकटेच असल्याने आजीला उचलण्यासाठी मदत करण्याचा विचार मनात आला. मी हात पुढे करताच मोठी मेहुणी म्हणाली, ‘‘दिनेश, तुम्ही हात लावू नका. तुम्ही जावई आहात, तुमचा हात लागल्यास आईला नरकात जावे लागेल,’’ या बहाण्याने तिने तिच्या पतीलाही हात लावण्यापासून वाचवले.

आजींच्या मृत्यूपर्यंत मी त्यांची सेवा करत राहिलो. त्यावेळी मी जावई आहे हे कोणालाच आठवत नव्हते, पण आजींना मोक्ष मिळण्याचा प्रश्न होता, त्यामुळे त्यांना हात लावून मला त्यांच्या मोक्षाचे दरवाजे बंद करायचे नव्हते.

आजींना उचलणे काकांना एकटयाला शक्य नव्हते. ते स्वत: ६५ वर्षांचे होते. आजी ८९ वर्षांच्या होत्या. तरीही काका, माझी पत्नी आणि वहिनी आजींना उचलून स्ट्रेचरवर आणू लागले. माझ्या दोन्ही मेहुण्या स्ट्रेचर धरून होत्या. स्ट्रेचरवर ठेवण्याच्या प्रयत्नात मृतदेह जमिनीवर पडला.

कसाबसा तो जमिनीवरून उचलून पुन्हा स्ट्रेचरवर ठेवण्यात आला.

मृतदेह घरी नेण्यात आला. शवपेटी सजवण्यात आली. २० किलो गुलाबाची फुले आणि तेवढयाच संख्येने मखाने मागवण्यात आले. एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या आईची अंत्ययात्रा निघाली. त्यांची संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागली होती, कारण कोणी म्हणू नये की, मुलाने आईसाठी काही खर्च केला नाही.

महिला घोळक्याने येत होत्या. मृतदेहाजवळ येताच सर्वांनी एकसुरात आरडाओरडा केला. किती विलक्षण सुसंवाद होता तो. काही क्षणातच पुन्हा शांतता पसरली. आधी आलेल्या महिला मागे सरकून बसल्या, जिथे त्या मृत व्यक्तीच्या म्हणजे आजीबद्दलच्या सर्व गोष्टींवर आपापसात चर्चा करू शकतील. आजींच्या हयातीत त्या इकडे एकदाही आल्या नसतील, पण आता कॉलनीतल्या सगळया महिलांची गर्दी झाली होती.

काही वेळाने आवाज आला, ‘‘नातू कुठे आहे? त्याला बोलवा, आजींच्या पायाला स्पर्श करायला लावा. आजींना मोक्ष मिळेल.’’

मी द्विधा मनस्थितीत होतो. माझ्या स्पर्शाने आजी नरकात गेल्या असत्या, पण माझ्या मुलाच्या स्पर्शाने नाही. त्या आजारी असताना त्यांना कोणी हात लावायलाही तयार नव्हते.

माझ्या दोन्ही मेहुण्या आणि सुनेने आपापल्या मुलांना मृतदेहाकडे नेण्यास सुरुवात केली.

मी विचार केला, माझे दोन्ही मेहुणे आले नाहीत हे बरं झालं, नाहीतर त्यांचेही माझ्यासारखेच झाले असते आणि त्यांनाही पुतळयासारखे कोपऱ्यात बसावे लागले असते.

एक छायाचित्रकारही होता. मृतदेहावर चादर घालतेवेळी भाऊसाहेबांचे लक्ष बहुधा आजींच्या मानेकडे आणि मनगटाकडे गेले. सोन्याचे हार आणि बांगडया होत्या. किमान ४ तोळे सोने होते भाऊसाहेबांनी ते काढून घेतले, जणू कोणीतरी ते घेऊन पळून जाणार होते.

मृतदेह रुग्णवाहिकेवर ठेवून सर्वजण घाटाकडे निघाले. घाटावर एक लाकडी चिता तयार होती. चितेवर मृतदेह ठेवण्यापूर्वी नदीला प्रदक्षिणाही घालायची होती. पण अजूनही कवटी फुटली नव्हती. न्हाव्याने भाऊसाहेबांचे केस काढायला सुरुवात केली. मुंडन विधीनंतर भाऊसाहेबांच्या अंगावर पांढरी वस्त्रे होती. थंड वाऱ्यामुळे भाऊसाहेब थरथरत होते.

मृतदेहाला आंघोळ घालून चितेवर ठेवण्यात आले. आता प्रतीक्षा होती ती गुरुजींची, जेणेकरून मुखाग्नी देता येईल. दुसरीकडे, गुरुजी मृतदेहावर पडलेल्या इतर मृतदेहांचा हिशोब करण्यात व्यस्त होते. सर्वाकडून पूर्ण पैसे घेऊनच ते आमच्या दिशेने आले. मंत्रोच्चारासह भाऊसाहेबांनी अग्नी दिला आणि चिता पेटली.

दुसऱ्या दिवशी, घरातील सर्व वडीलधारी चितेची राख एका भांडयात गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचली, जेणेकरून ती वाराणसी, अलाहाबाद, गया आणि पुरीसारख्या ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करता येईल.

हा कलश घेऊन फक्त भाऊसाहेबांनाच जावे लागले. माझ्या कानावर आले होते की, भाऊसाहेब आजी हयात असताना एकदाही त्यांच्यासोबत कुठेही गेले नव्हते. पत्नीसोबत मात्र हनीमूनसाठी काश्मीरहून कन्याकुमारीपर्यंत गेले होते. त्यांचे म्हणणे होते की, त्यांनी आईसाठी इतकेही केले नाही तर लोक काय म्हणतील? त्यांना सतत लोक काय म्हणतील याचीच भीती वाटत होती.

शेवटी अंघोळीची वेळ झाली. अंघोळ न करता घरात शिरल्यास घर अपवित्र होईल अशी सर्वांना भीती होती. मी स्पष्टपणे नकार दिला, ‘‘खूप थंडी आहे, मी घरी जाऊन गरम पाण्याने अंघोळ करेन. आजी तर आता आपल्यात नाहीतच.’’

मी सोडून सगळयांनी थरथर कापत नदीत अंघोळ केली. घरी परत येईपर्यंत त्यांचे दात एकावर एक आदळत होते. त्यांच्यापैकी काहींच्या नाकातून पाणी वाहणेही सुरू झाले होते. घरी अजून पुजाऱ्यांचे देणे बाकी होते. दहावे… तेरावे पुजाऱ्यांना दान, नातेवाईकांना जेवण, स्थानिक लोक, हजारोंचा खर्च होता.

पत्नीला सोडून मी परत आलो. परतताना पत्नीने सांगितले की, आजींच्या उपचारांपासून ते तेराव्यापर्यंत सुमारे २ लाख रुपये खर्च झाले, भाऊसाहेबांचा रुबाब सर्वत्र वाढला होता. पुजाऱ्यांनी एक प्रकारे आई स्वर्गात गेल्याचा दाखला दिला होता. पुढच्या वर्षी श्राद्ध करायलाही सांगितले होते. छायाचित्रकारालाही पैसे देण्यात आले होते. जवळपास महिनाभर सर्वजण हॉटेलमध्ये थांबले होते. भोजन, वाहतूक, भाडे इत्यादींवर भरपूर पैसा खर्च झाला, तसाच तो पुजाऱ्यांना खूश करण्यासाठीही खर्च झाला. इतका खर्च होऊनही भाऊसाहेबांचा चेहरा आनंदाने फुलला होता. आईच्या अंत्यसंस्कारात भरपूर पैसा वाया घालवून त्यांनी समाजात स्वत:चे मोठे स्थान निर्माण केले होते.

खरा कळस ७ दिवसांनी पाहायला मिळाला. आजींचे कपाट आणि कपडे तपासले असता एका कपाटात कागदाखाली एक लिफाफा सापडला, जो बहुधा ७-८ वर्षांपूर्वीचा होता. ते मृत्युपत्र होते. सर्वांसमोर कपाट उघडल्यावर माझ्या पत्नीच्या काकांना ते लपवता आले नाही. नाईलाजाने त्यांना मृत्युपत्र सर्वांसमोर वाचावे लागले. मृत्युपत्राशिवाय आजी मरण पावल्या असत्या तर ज्याच्या हाताला जे लागेल ते त्याचे होईल, असे सर्वांना वाटत होते.

आजींनी मृत्युपत्रात स्पष्टपणे लिहिले होते की, त्यांच्या मालकीचे जे काही आहे ते दीप्तीला मिळेल आणि त्यात गावातील त्यांचे वडिलोपार्जित घर आणि लॉकरमध्ये ठेवलेले तसेच त्यांनी घातलेल्या दागिन्यांचाही समावेश होता. मृत्यूपत्र ऐकून सर्वांचे तोंड उघडे पडले.

माझ्या मेहुण्या एकसुरात म्हणाल्या, ‘‘आता आम्हाला समजले की दीप्ती आजीची इतकी सेवा का करत होती. तिला माहीत होतं की फक्त तिलाच त्याचे फळ मिळेल.’’

दीप्ती काहीच बोलली नाही आणि दुरूनच तिने मला काही न बोलण्याचा इशारा केला.

घरी आल्यावर दीप्तीने मला एक पिशवी दिली, ज्यावर धूळ साचली होती. ती म्हणाली, ‘‘आजीला एके दिवशी रुग्णालयात शुद्ध आली होती. ही पिशवी तिच्या जुन्या कपडयांमध्ये कुठेतरी असावी. तिने आग्रह केला की, मी ती पिशवी आणावी. मी अनेकदा नकार दिला, पण आजीने हट्टच धरला. मी पिशवी आणल्यावर तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, हे मायाकडून तुम्हा दोघांसाठी आहे. हे कोणाला कळू देऊ नकोस. मी जे लिहिले आहे ते तुला मिळेल की नाही, हे मला माहीत नाही. मी मात्र पिशवी उघडली नाही, तशीच घरी आणली. आता बघूया, त्यात काय आहे ते.’’

बॅगेत जवळपास ५ किलो सोन्याचे दागिने होते. ते जुन्या डिझाईनमधले होते. ही बॅग काकूंच्या नजरेतून कशी निसटली ते मला समजले नाही, कदाचित आजींनी ती जुने कपडे असलेल्या कपाटात लपवून ठेवली होती. त्या कपडयांना खूप वास येत होता. कदाचित आजींनी मुद्दामहून लघवी केलेले कपडेही त्या कपाटात कोंबून ठेवले होते, जेणेकरून कोणतेही काका-काकू त्याला हात लावणार नाहीत.

शेवटच्या दिवशीही कोणीही कपाट उघडले नव्हते. आम्हा दोघांनाही पैशांची हाव नव्हती. आजींवरील प्रेमामुळेच दीप्तीने तिची रात्रंदिवस सेवा केली आणि तिची सेवाभावना पाहून मीसुद्धा तिला एकदाही थांबवले नाही, आजीच आमच्या लग्नासाठीची सर्वात मोठी शुभचिंतक होती. पैसा ही मोठी गोष्ट आहे, पण प्रेम त्याहूनही मोठे आहे ना?

मूर्ख

* कथा * सुधा अमृता

कार्यालयातून घरी परतत असताना वाटेत वहिनी भेटली. ती खूप दु:खी दिसत होती. विचारपूस केल्यावर ती म्हणाली, ‘‘निवेदिता आता या जगात नाही, असा रोमितचा संदेश मुंबईहून आला आहे.’’

हे ऐकून मला धक्काच बसला. मी घरी कसा पोहोचला माझे मलाच समजले नाही. घरी येताच एका खोक्यातून निवेदिताचा फोटो काढून बघत बसलो. तेवढयात श्रद्धा आली, तिने विचारले, ‘‘इतका काळजीपूर्वक कोणाचा फोटो बघतोस?’’

‘‘तुला माहीत नाही श्रद्धा, ही निवेदिता आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी कोविड झाल्यामुळे पती आणि दोन मुलांना रडत सोडून तिने हे जग कायमचे सोडले.’’

‘‘खूप वाईट झाले, पण तू निवेदिताला कसं ओळखतोस? निवेदिताचा फोटो तुझ्याकडे कसा?’’

‘‘तू गोविंदपुरीच्या माझ्या वहिनीला तर ओळखतेसच.’’

‘‘हो, हनीमूनवरून परतताना आपण त्यांच्या घरी काही काळ थांबलो होतो.’’

‘‘बरोबर ओळखलेस. निवेदिता तिची भाची होती.’’

‘‘पण याआधी कधी तू निवेदिताबद्दल बोलला नाहीस?’’

‘‘अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित मी तुला अजून सांगितल्या नसतील.’’

‘‘पण मी तुझ्यापासून कधी कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नाही?’’

‘‘तुला नेमके काय म्हणायचे आहे?’’

‘‘काही नाही. तुम्ही पुरुष कसे असता तेच समजत नाही. आता तुझ्या बोलण्यातून स्पष्ट झाले की, तुझ्या आयुष्यात अशा किती निवेदिता आल्या असतील काय माहीत?’’

‘‘तू पुन्हा चुकीचे बोलतेस.’’

‘‘सत्य कडूच असते. वहिनीची भाची आणि त्रास तुला होतोय आणि तरीही तू म्हणतोस की, तुझा तिच्याशी काहीही संबंध नाही.’’

‘‘पण मी निवेदिताशी कधी नीट बोललोही नाही, हे मी तुला कसं समजावू?’’

‘‘जर मला दुसऱ्या कोणी सांगितले असते तर कदाचित मी त्यावर विश्वास ठेवलाही असता.’’

‘‘तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजेस, कारण तुझा पती इतका मूर्ख आहे की, तो गरज असली तरीही खोटं बोलू शकत नाही हे तुला चांगलेच माहीत आहे.’’

‘‘खोटं बोलू नकोस, पण मला माहीत आहे की, वायफळ बोलायची तुझी सवय आहे. त्यामुळेच तू आयुष्यात प्रगती करू शकला नाहीस. कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तू जास्त काळ नीट राहू शकत नाहीस.’’

‘‘बरोबर बोललीस. तुला माझ्यासारखा पती मिळाला, हे तुझे भाग्य समज. मी विवाहित असूनही सरळ जीवन जगतोय, त्यामुळेच मी आजपर्यंत प्रगती करू शकलो नाही.’’

‘‘कदाचित आतापर्यंत तुला निवेदिता न भेटल्याचा पश्चाताप होत असेल.’’

‘‘माझे जाऊ दे, पण निदान त्या गरीब मुलीवर तरी दया कर आणि आता तर ती या जगातही नाही.’’

‘‘अरे वा, तुझ्या या तत्वज्ञानाबद्दल मी काय बोलू? तरीही, मला सांग, तू तिला कसा ओळखत होतास?’’

‘‘तुला खरंच जाणून घ्यायचं असेल तर ऐक. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा एमएससी केल्यानंतर मला दिल्लीत नोकरी लागली. गाव सोडताना माझ्या वडिलांनी मला एका दूरच्या भावाचा पत्ता देऊन सांगितले होते की, बाळा, हा तुझ्या एका दूरच्या भावाचा पत्ता आहे. त्याच्याशिवाय दिल्लीत माझ्या ओळखीचे कोणीही नाही. ते एक मोठे शहर आहे. गरज पडल्यास त्याच्याकडे जा.

‘‘दिल्लीला पोहोचल्याच्या तिसऱ्या दिवशी मी त्या भावाच्या घरी गेलो. पहिल्याच भेटीत भाऊ आणि वहिनीच्या वागण्याने मी आनंदी झालो. त्यानंतर मी अनेकदा त्यांच्या घरी जाऊ लागलो. वहिनीबरोबर माझे चांगले जमू लागले.’’

‘‘अरे, खूप बोललास, आता लगेचच नायिकेला तुझ्या कथेत हजर कर.’’

‘‘एका संध्याकाळी मी वहिनीच्या घरी गेलो. मी दिवाणखान्यात प्रवेश करताच थांबलो. समोरच्या सोफ्यावर एक मुलगी बसून भरतकाम करत होती. तिचे मोकळे, काळे, घनदाट, लांब केस पाठीवर लटकत होते. खिडकीतून मावळतीचा सूर्य तिच्यावर सोनेरी किरणे उधळत होता.

‘‘मी त्या मुलीला माझ्या वहिनीच्या घरी पहिल्यांदा पाहात होतो. माझा आवाज ऐकून तिने भरतकामातून डोळे वर करून पाहिले आणि दचकली. मी काहीही न बोलता आत गेलो.

‘‘वहिनी स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती. मला पाहून ती आनंदी झाली आणि म्हणाली, अनिल, बरं झालं आलास. छोले-भटूरे बनवताना मला तुझी आठवण येत होती. तुला ते खूप आवडतात ना?

‘‘वहिनीच्या प्रेमळ बोलण्यामुळे मला फार बरे वाटले आणि मी म्हणालो, वहिनी, कृपया मला बसायला टेबल दे.

‘‘त्यावर ती म्हणाली, तू इथे या गरमीत बसणार?

‘‘मी म्हणालो, तू एवढया गरमीत छोले-भटुरे बनवू शकतेस तर मी इथे बसून ते खाऊ शकत नाही का?

‘‘वहिनी हसली आणि पदराने कपाळ पुसू लागली, मग मी अचानक विचारले की, बाहेर कोण बसली आहे?

‘‘वहिनीने सांगितले, ती तिची भाची निवेदिता आहे. वहिनीच्या भावाचे निधन झाल्यामुळे आणि घरी दुसरा आधार नसल्यामुळे, तिने आपली वहिनी आणि भाचीला बोलावून घेतले आहे.

‘‘काही वेळाने ती मुलगी स्वयंपाकघराच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिली.

‘‘माझ्या लक्षात आले की, वहिनीशी मी इतक्या मैत्रीपूर्णपणे बोलताना पाहून तिला आश्चर्य वाटत होते, पण मला बघितले नसल्यासारखे ती भासवत होती. वहिनीने ओळख करून दिली की निवेदिता, हा माझा दीर अनिल आहे.

‘‘निवेदिताने वर पाहिलं आणि मलाही पाहिलं, त्यानंतर लगेच वळून दिवाणखान्याच्या दिशेने गेली.

‘‘त्यानंतर तिने मला फक्त वहिनीच्या घरातील सदस्य म्हणून पाहिले. बारावीचे शिक्षण घेऊन ती गावातून आली होती. दिल्लीत आल्यानंतर ती चांगला अभ्यास करू शकेल आणि तिला एक चांगले स्थळही इथे सहज मिळू शकेल, अशीच काहीशी इच्छा वहिनी आणि निवेदिताच्या आईच्या मनात असल्याचं माझ्या लक्षात आलं.’’

‘‘हे बघ, मी तुला आधीच सांगितलं की, त्या दिवसांत दिल्लीत राहण्याची माझी एकमेव जागा माझ्या वहिनीचे घर होते. त्या वयातही मला उनाडपणा आवडत नव्हता. मोकळया वेळेत मी माझ्या खोलीत बसून प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचायचो आणि थकवा जाणवला की, वहिनीच्या पदराची मायेची उब मला तिच्या जवळ नेत असे. ती अनेकदा मला गमतीने म्हणायची की अनिल, लग्न झाल्यावर तू तुझ्या पत्नीचा असा गुलाम होशील की बिचारीचा जीव संकटात सापडेल. तिच्या या बोलण्यात किती तथ्य होते, हे तू मान्य करशीलच.’’

‘‘स्वत:चं कौतुक सोड, पत्नीचे गुलाम असणारे पुरुष चांगले असतात का?’’

‘‘तुला चांगलं माहीत आहे की, पुरुषांसारखा कणखरपणा माझ्याकडे नाही. मला कधीच राग येत नाही. नोकर मला घाबरत नाहीत. मला कोणाच्याही मनाशी खेळता येत नाही. म्हणूनच एक सुंदर मुलगी माझ्या अगदी जवळ जाऊनही मी तिच्यावर प्रेम करू शकलो नाही.’’

‘‘निवेदिता सुंदर होती का? फोटोवरून तर तसे वाटत नाही.’’

‘‘हा फोटो अगदी साध्या पोशाखात काढला होता, शिवाय फोटोमध्ये तुला जसे पाहिजे ते दिसत आहे. मला मात्र तिचा गव्हाळ रंग, मोठे डोळे आणि निरागस चेहरा खूप आवडला होता.’’

‘‘अरे, इतक्या लवकर का थांबलास? अजून तिची स्तुती कर.’’

‘‘श्रद्धा, टोमणे मारू नकोस, हे सत्य आहे.’’

‘‘अरे, माझ्या मूर्ख पतीदेवा, तुला थोडासा विनोदही सहन होत नाही. प्रकरण खूप गंभीर आहे, पुढे बोल.’’

‘‘यानंतर काही विशेष नाही, पण हो, कधी कधी धूसर चित्र डोळयांसमोर येतं. जसे पहाटे अर्ध्या झोपेत दिसणारे स्वप्न, ज्याला आकार नसतो तर त्याची नुसती झलक मनात अस्वस्थतेची भावना निर्माण करते. ते चित्र निवेदिताचे असेल असे वाटत असेल तर तू चुकत आहेस. मी सांगू शकत नाही की तुम्हा स्त्रियांच्या बाबतीत हे असे का घडते?’’

‘‘तू त्या वेळी निवेदिताला हा. प्रश्न विचारला असतास तर तुला ते कळले असते.’’

‘‘मी तुला पुन्हा एकदा सांगतो की, मी तिथे गेल्यावर आमची भेट नक्कीच व्हायची, पण आम्ही क्वचितच एकमेकांशी बोलायचो. वहिनी, तिची आई आणि आम्ही सगळेच बहुतेक संध्याकाळी बाहेर खुर्च्यांवर बसायचो. ती तिची खुर्ची काही अंतरावर ठेवायची. का ते माहीत नाही? होय, हे खरं आहे की, जेव्हाही वहिनीने विचारलं तेव्हा ती गाणे गायची. कधी कधी ती गाण्यांमध्ये इतकी रमून जायची की ती एकापाठोपाठ एक गाणीच म्हणत राहायची. तिचं गाणं बंद झाल्यावर आम्ही अनेकदा बोलायला विसरायचो.’’

‘‘ती कशी गायची?’’

‘‘श्रद्धा, मला काय माहीत? जरी सर्वजण तिच्या गाण्याचे कौतुक करत असले, तरी जेव्हा ती गायची तेव्हा तिच्या गाण्यातील वेदना आणि दु:ख माझ्या हृदयात आहे असे मला वाटायचे, पण ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते, भाषा नव्हती. तिची काही गाणी मी गुपचूप रेकॉर्ड केली होती.’’

‘‘ती फक्त तुझ्यासाठीच गाणी गायची, असेच तुला म्हणायचे आहे का?’’

‘‘असा मुर्खासारखा विचार मी कधीच केला नाही. एखाद्या मुलीने डोळे वर करून पाहिले म्हणजे ती काही खास कारणाने माझ्याकडे बघत आहे, असा विचार केल्यास ते माझ्या मूर्खपणाशिवाय दुसरे काय असेल? आणि रेकॉर्डिंगबद्दल बोलायचे तर त्यानंतर माझे मोबाईल फोन अनेकदा बदलले गेले. आता तो आवाज कुठे शोधणार?’’

‘‘तुझे हे बोलणे माझ्या डोक्यात आले नाही. बरं, पुढे सांग.’’

‘‘तिच्या आईला तिच्या लग्नाची खूप घाई होती, पण मी अनेकदा वहिनीला हे बोलताना ऐकले होते की, लग्नाची इतकी काय घाई आहे? मुलगी, निदान बी.ए. होऊ दे. तिला शिकू दे, वेळ आल्यावर लग्न होईलच.

‘‘पण, तिची आई सांगायची की, लग्नासाठी आधीपासून प्रयत्न करावे लागतात. हे मुलीचे लग्न आहे, कुठली थट्टा-मस्करी नाही.

‘‘एक दिवस निवेदिताच्या आईने मला सांगितले की अनिल, तू खूप चांगल्या नोकरीला आहेस. तू निवेदितासाठी तुझ्यासारखाच एखादा मुलगा शोधशील का?

‘‘त्यावर वहिनी माझी चेष्टा करत म्हणाली की, तू पण खूप चांगल्या माणसाला सांगत आहेस. आपल्यापेक्षा लहान असलेल्यांशीही बोलताना तो घामाने भिजतो, तो आपल्या मुलीसाठी कोणता मुलगा शोधणार? होय, पण त्याच्या नजरेत नक्कीच एक मुलगा आहे.

‘‘पण, वहिनी माझ्याकडे बघून नुसती हसत होती. मी तिथे क्षणभरही थांबू शकलो नाही. मी लगेच उठून बाहेर आलो. माझी वहिनी माझ्याबद्दल काय विचार करते, या विचाराने मी अस्वस्थ झालो.

‘‘मला लाज वाटत होती. मला वाटलं, मी निवेदिताच्या घरी तिच्या आकर्षणापोटी येत नाही हे मी वहिनीसमोर कसं सिद्ध करू? तिला मी कसं सांगू की, मी एवढा स्वार्थी नाही की, मी माझ्या वहिनीच्या निस्वार्थ मायेचा असा दुरुपयोग करेन. निवेदिता यायच्या आधीही मी वहिनीकडे अनेकदा यायचो आणि आताही कधी कधी येतो. निवेदिता आल्यानंतर माझ्या वागण्यात काही बदल झाला होता का?

मी वहिनीला असा विचार करण्याची संधी दिलीच कशी? मी संपूर्ण रस्ताभर या प्रश्नांचाच विचार करत होतो. माझ्याकडून चूक झाली आहे का? माझ्या कोणत्याही कृतीतून नकळतपणे वहिनीच्या स्त्री-मनाच्या नाजूक पटलावर काहीतरी प्रतिबिंब उमटले असेल का? हे कधी घडले? कसे घडले? मला काही समजले कसे नाही?

‘‘घरी आल्यावर मी डोळे मिटून खाटेवर पडलो, पण मन अस्वस्थ होतो. मनाची ही अस्वस्थता वाढतच गेली. शेवटी मी ठरवले की, काहीही झाले तरी वहिनीच्या मनातील संशय दूर केला पाहिजे.

‘‘दरम्यान, एके दिवशी अचानक माझी कॅनॉट प्लेसमध्ये रोमितशी भेट झाली. त्याने माझ्यासोबत एमएससी केले होते. तो अभ्यासात हुशार होता.

आयएएस स्पर्धेत निवड झाल्यानंतर तो राजपत्रित अधिकारी झाला. बोलण्याच्या ओघात जेव्हा मला समजले की, रोमित अजूनही अविवाहित आहे, तेव्हा माझ्या मनाने जणू आनंदाने उडी मारली.

‘‘त्याच्यासमोर प्रस्ताव मांडण्यास उशीर करणे मला योग्य वाटले नाही. सुरुवातीला गंमत म्हणून बोलणे सुरू झाले, पण काही वेळाने रोमित माझ्या बोलण्यावर गंभीर दिसला. त्याला दिल्लीबाहेरचे जीवन जगावेसे वाटले नाही. संधी साधून त्याने मला निवेदिताबद्दल विचारले.

‘‘मुलीला बघायचे ठरल्यावर रोमित म्हणाला, हे काय बोलतोस अनिल? जर मुलगी तुझ्या बघण्यातली आहे आणि तुला ती माझ्यासाठी सुयोग्य वाटत असेल तर ठीक आहे, पण माझी आई मुलगी बघितल्याशिवाय होकार देणार नाही.

‘‘मी म्हणालो नक्कीच… तुला हवं तेव्हा आईला घेऊन ये.

‘‘तो म्हणाला ठीक आहे अनिल, मी पुढच्यावेळी दिल्लीला येताना काही दिवसांची सुट्टी काढून येईन.

‘‘रोमित यापेक्षा जास्त काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला बरंच काही सांगून गेले.

‘‘त्याच रात्री मी माझ्या वहिनीला रोमितबद्दल सगळं सांगितलं. वहिनी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तू खरं बोलतोस का अनिल?

‘‘मी म्हणालो, वहिनी, मी कधी तुझ्याशी खोटं बोललो आहे का?

‘‘वहिनी थोडावेळ माझ्या चेहऱ्याकडे बघतच राहिली, त्यानंतर म्हणाली, ठीक आहे.

‘‘तिला जितका आनंद होईल, असं मला वाटलं होतं, तितका आनंद मला तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता, पण निवेदिताच्या आईने अत्यानंदाने माझ्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाली, अनिल, तू हे नाते लवकर जुळव, असे स्थळ सहसा मिळत नाही.

‘‘थोडयाच दिवसांत निवेदिताचे लग्न ठरले. सर्व नातेवाईकांमध्ये निवेदिताची आई माझे कौतुक करायची आणि प्रत्युत्तरात ते सर्वही माझे कौतुक करायचे. एवढं मोठं काम माझ्यासारख्या मुर्ख माणसाकडून होईल, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती.

‘‘लग्नाची सर्व तयारी झाली होती. अचानक निवेदितानेच गोंधळ घातला. ती लग्न न करण्यावर अडून बसल्याचे मला समजले.

‘‘वहिनी मला म्हणाली, आता तूच जाऊन निवेदिताची समजूत काढ.

‘‘हे ऐकून मी स्तब्ध झालो आणि मग विचारले की, निवेदिताला अचानक काय झालं? मी तिला काय समजावू?

‘‘हे ऐकून वहिनी म्हणाली, अनिल, तू समजावलंस तरच काहीतरी होऊ शकतं. तिचं तुझ्यावर प्रेम आहे, हे तुला कळायला हवं.

‘‘मी वहिनीच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो. माझा चेहरा पडला होता. मी काळजीत पडलो. लग्नाचं प्रकरण इतकं पुढे सरकलं होतं की मला माघार घ्यायला लाज वाटली असती. मी कुणाला तोंडही दाखवू शकणार नव्हतो.

‘‘वहिनीच्या सांगण्यावरून मी तिच्याकडे गेलो. ती दुसऱ्या मजल्यावरील खोलीत खिडकीजवळ उभी राहून रडत होती. मी तिला हाक मारली. इतक्या दिवसांत मी पहिल्यांदाच तिच्याशी समोरासमोर बोललो.

‘‘मी म्हणालो, निवेदिता, लग्नाची बोलणी खूप पुढे गेली आहेत. आता तू सगळयांना खाली मान घालायला लावणार आहेस का?

‘‘तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिले. मग ती लगेच म्हणाली, आणि माझे प्रेम, माझ्या भावना?

‘‘मी विचारले तुला या नात्यात काही अडचण आहे का?

‘‘तिचा गोल चेहरा लाजेने आणखी खाली गेला. तिने ओढणीचे टोके गुंडाळायला सुरुवात केली.

‘‘मी पुन्हा म्हणालो, तू या सर्वांचा पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करू शकत नाहीस का?

‘‘तिने डोळे वर करून काही क्षण माझ्याकडे पाहिले. मग ती म्हणाली, हे तू काय बोलतोस?

‘‘निवेदिताचा प्रश्न ऐकून मी थक्क झालो. मग ती म्हणाला की, तुझी आई, आत्ये सर्वांची हीच इच्छा आहे… दुसरीकडे रोमितही वाट पाहात बसला होता…

‘‘बोलणे अर्धवटच राहिले. माझा कंठ दाटून आला. अचानक मलाच सर्व काही निरर्थक वाटू लागले.

‘‘ती म्हणाली, मला हे सर्व माहीत आहे, पण तुझेही तेच म्हणणे आहे का?

‘‘मी जबरदस्तीने हसलो आणि म्हणालो, माझे म्हणणे मी नक्कीच सांगेन.

‘‘माझं उत्तर ऐकून ती म्हणाली, तुझा नकार का आहे? उगाच मित्रासमोर तुला मान खाली घालावी लागणार नाही.

‘‘मी म्हणालो नाही, तसं काही नाही. जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच आहे.

‘‘ती म्हणाली, ‘‘माझं भलं? पण ते कशात आहे?

‘‘यानंतर निवेदिताने मला काही बोलण्याची संधी दिली नाही आणि पटकन खोलीतून बाहेर पडून पायऱ्या उतरून खाली निघून गेली.

‘‘लवकरच लग्नाचा दिवस उजाडला. घरभर गोंधळ सुरू होता. मी व्यस्त आहे हे दाखवण्यासाठी मी इकडे तिकडे फिरत राहिलो, पण मला काहीही करण्यात रस नव्हता. वरात दारात आली होती. त्याचवेळी वहिनीला शोधत मी दुसऱ्या मजल्यावरील त्याच खोलीत पोहोचलो.

‘‘लाल रंगाची खूपच सुंदर साडी नेसलेली निवेदिता, कपाळावर लाल बिंदी आणि पायात पैजण घालून गुडघ्यांमध्ये चेहरा खाली करून बसली होती. त्यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे बघतच राहिलो. अचानक तिने मान वर केली. ती काही वेळ माझ्या तोंडाकडे बघतच राहिली. मी पाहिले की तिचे दोन्ही डोळे खूप लाल झाले होते. लग्नाच्या रात्री सगळया मुली रडतात, असं मी ऐकलं होतं. कदाचित तीही रडली असावी. तिचे लाल डोळे मला खूप आवडले.

निवेदिता उभी राहिली आणि जड अंत:करणाने म्हणाली, हीच तुझी इच्छा होती ना? तिच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.

‘‘मग मी तिथे थांबूच शकलो नाही. मान खाली घालून मी गुन्हेगारासारखा बाहेर आलो. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी आले. यानंतर मला त्या घरात राहावंसं का वाटलं नाही माहीत नाही.’’

‘‘त्यानंतर काय झाले?’’

‘‘श्रद्धा, त्यानंतर काही झाले नाही.’’

‘‘तू निवेदिताला पुन्हा भेटला नाहीस का?’’

‘‘नाही.’’

‘‘ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे.’’

‘‘श्रद्धा, तुला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. लग्नाच्या ८ दिवसानंतर रोमित आपल्या पत्नीसह मुंबईला परतला. कदाचित त्याला फारशी रजा मिळाली नसावी. इथे माझी बदलीही लखनऊला झाली. त्यानंतर आपलं लग्न झालं आणि मीही कामात व्यस्त झालो. तेव्हापासून आपण एकत्र आहोत. लखनऊनंतर माझी कानपूरला बदली झाली, नंतर घाटमपूर आणि आता १२ वर्षांनी मी पुन्हा दिल्लीला आलो आहे. या १२ वर्षात रोमित आणि वहिनीने अनेकवेळा पत्र लिहून त्यांना फोन करण्याची विनंती केली, पण रोमित आणि वहिनीकडे जाण्याची इच्छा अर्धवटच राहिली.’’

‘‘आपल्याला दिल्लीत येऊन एक महिना झाला आहे. या महिनाभरात एकदाही तू वहिनीच्या घरी का गेला नाहीस?’’

‘‘मी वहिनीच्या घरी गेलो नाही, असा अंदाज तू कसा लावलास?’’

‘‘याचा अर्थ तू वहिनीच्या घरी जातोस.’’

‘‘नाही, हे रोज कसे शक्य आहे?’’

‘‘तू कदाचित रागावली असशील, पण इथे आल्याच्या चौथ्या दिवशीच मी त्या मायाळू वहिनीला भेटायला गेलो होतो. तिथे गेल्यावर मलाही निवेदिताची आठवण आली, पण मी वहिनीकडे तिचा उल्लेख टाळला.

‘‘गप्पांच्या ओघात वहिनीने सांगितले की, निवेदिता तिच्या पतीसोबत खूप आनंदी आहे. दिल्लीला आल्यावर तिला माझी आठवण येते. ते ऐकून मी निश्चितच समाधानी झालो.

‘‘त्यानंतर मला इच्छा असूनही वहिनीच्या घरी जाता आले नाही, पण योगायोगाने आज सेक्टर ३ च्या वळणावर वहिनी भेटली आणि…’’

निवेदिताच्या निधनाची दु:खद बातमी तिने सांगितली.

‘‘अनिल, मला निवेदिताला बघता आले नाही, याची खंत वाटते.’’

‘‘तिला बघून तू काय करणार होतीस?’’

‘‘ते बघितल्यावर आणि भेटल्यावरच सांगता आले असते. तू तिला एकदाही आपल्याकडे बोलावले नाहीस. वाईट वाटून घेऊ नकोस, पण तू खरंच खूप मोठा मूर्ख आहेस…’’

‘‘श्रद्धा, यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? कदाचित तू बरोबर आहेस. आता बिचाऱ्या रोमितचे काय होणार, हा विचार मनात येतोय. मला त्याला पत्र लिहायचे आहे, पण खूप विचार करूनही शब्द सापडत नाहीत. असे शब्द ज्यांच्या मदतीने रोमित निवेदिताने अर्धवट सोडलेल्या फुलांचे संगोपन करू शकेल आणि त्यांच्या सुगंधाने स्वत:ला सुगंधित करू शकेल.

‘‘कोणत्याही शब्दकोषात असे शब्द नाहीत का, जे मृत व्यक्तीला जिवंत करू शकतील?’’

‘‘श्रद्धा, तू माझी चेष्टा करतेस का मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करण्याइतकी ताकद माझ्या शब्दांत नाही, पण माझ्या बोलण्याने तिघांच्या ओठांवरचे हिरवलेले हास्य परत आणलं तरी माझ्यासारख्या मूर्ख माणसासाठी ते खूप महान कार्य असेल.

नीलोफर

कथा * शर्मिला चव्हाण

खिडकीसमोर डोकावणाऱ्या अशोकाच्या फांदीवर तिने एक छोटासा निवारा बनवला होता. जितकी छोटी ती होती तितकेच छोटे तिचे घर होते. मालती जेव्हा कधी शुद्ध हवेसाठी खिडकीपाशी यायची तेव्हा तिला पाहिल्याशिवाय परत जात नसे. ती खूप सुंदर होती. जिथे पाठीचा भाग संपतो, तिथून तिची शेपूट होती. तपकिरी लहान पंखांवर २-४ निळया पिसांचे आवरण होते. या निळया आवरणामुळे ती इतर चिमण्यांपेक्षा वेगळी दिसायची. त्या छोटयाशा मादीलाही तिच्यातील या सर्वात सुंदर गोष्टीचा नक्कीच अभिमान होता.

मोकळया वेळेत, ती तिच्या चोचीने निळी पिसे साफ करायची, तिच्या हलक्या पिवळया तपकिरी डोळयांनी आजूबाजूला एक नजर टाकून पाहायची की, तिच्या सुंदर रुपाचे कोणी कौतुक करत आहे की नाही. त्या चिमुकल्या पक्ष्याच्या पिसांमुळे मालतीने तिचे नाव ‘नीलोफर’ ठेवले होते.

‘‘आई, नीलोफरने कदाचित अंडी घातली आहेत… ती त्या घरटयातून बाहेर पडलीच नाही,’’ मालतीची २४ वर्षांची मुलगी नीलूने खिडकीजवळून मालतीला हाक मारली.

‘‘मलाही तसेच वाटतेय, म्हणूनच तिने खूप मेहनतीने घर बांधले,’’ असे म्हणत मालतीही खिडकीबाहेर डोकावू लागली.

नीलूला बाहेर बघताना पाहून मालती बोटांनीच नीलूचे केस नीट करू लागली.

‘‘आई, तू या पक्ष्याचे नाव नीलोफर का ठेवलेस?’’ नीलू अजूनही त्या चिमुकलीत हरवली होती.

‘‘तिची निळी पिसे खूप गोंडस आहेत, म्हणूनच ती निलोफर झाली,’’ मालती हसत म्हणाली.

‘‘तू माझे नाव नीलू का ठेवले?’’ नीलूने पुढचा प्रश्न केला.

‘‘कारण तुझे निळे डोळे झऱ्यासारखे पारदर्शक आहेत. तुझ्या मनातले सर्व काही तुझे डोळे सांगतात. म्हणून तू  नीलू आहेस,’’ मालती म्हणाली आणि तिने नीलूला व्हीलचेअरसह दिवाणखान्यात आणले.

नीलूने रिमोटने टीव्ही सुरू केला आणि ती पंजाबीतली नृत्याची गाणी पाहू लागली. कुठल्यातरी सणाचे ते दृश्य होते मुली रंगीबेरंगी कपडे घालून ढोलाच्या तालावर थिरकत होत्या. मालतीने हळूच नीलूकडे पाहिले. ती तल्लीन होऊन गाणे ऐकत होती आणि कमरेच्या वरच्या भागाने नाचण्यात गुंग होती.

तिला नाचण्यात तल्लीन झालेले पाहून  मालती नीलूच्या बालपणाच्या आठवणीत हरवून गेली…

‘‘आई, मला शास्त्रीय नृत्य आवडत नाही. मला नृत्याच्या तालावर थिरकायला लावणारी फिल्मी गाणी आवडतात,’’ ७ वर्षांच्या नीलूने हट्ट करून बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचायला सुरुवात केली होती.

‘‘हे काय आई? ती दिवसभर माकडासारखी उडया मारत राहाते… आरशासमोर उभी राहून कंबर मुरडत बसते. हिला आणखी काही काम नाही का?’’ नीलूपेक्षा ४ वर्षांनी मोठा असलेला शुभम चिडून विचारायचा.

‘‘तूही नाच ना, पण तुला तर नाचताच येत नाही,’’ असे म्हणत नीलू त्याला अधिकच चिडवायची.

वेळ पंख लावल्याप्रमाणे उडून गेली. नीलू ९ वर्षांची झाली.

‘‘शुभम उद्या सकाळी बसने शाळेच्या सहलीला जाणार आहे. आपण त्याला शाळेच्या बसपर्यंत सोडून येऊया,’’ मालतीने पतीला सांगितले.

‘‘मीही त्याला सोडायला येणार,’’ नीलूने रात्रीच सांगितले.

सकाळी सर्वजण कारने शुभमला शाळेच्या बसपर्यंत सोडून परत येत होते. ‘‘बाबा, थांबा ना, आपण तिथे जाऊन काहीतरी खाऊ. माझ्या मैत्रिणी सांगत होत्या की, इथे सकाळी वडापाव, इडली-डोसा आणि सँडविच खूप छान मिळते,’’ शाळेच्या वाटेवरील एका छोटया उपहारगृहाकडे बोट दाखवत नीलू म्हणाली.

सर्व गाडीतून उतरू लागले. तितक्यात नीलू धावत एकटीच रस्ता ओलांडू लागली.

‘‘नीलू… थांब बाळा…’’ जवळून जाणाऱ्या गाडीच्या ब्रेकसोबतच मालतीचा आवाजही दबून गेला.

क्षणार्धात फासे उलटे पडले होते. रक्ताच्या थारोळयात पडलेली नीलू रुग्णालयात बेशुद्धावस्थेत होती. तेव्हापासून आजपर्यंत ती कधीच उभी राहू शकली नव्हती. खेळणारे, धावणारे, नाचणारे बालपण कमरेखालून शांत झाले होते. तिचे विश्व व्हीलचेअरपुरतेच मर्यादित झाले होते.

‘‘आई, आज दादाला व्हिडिओ कॉल करूया, मला बॅग मागवायची आहे,’’ नीलूच्या आवाजाने भूतकाळात हरवलेली मालती वर्तमानात आली.

‘‘हो, आज शुभमला फोन लावूया,’’ अमेरिकेत नोकरी करणाऱ्या मुलाबद्दल त्या बोलत होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळीच भावाशी बोलून तिने बॅग आणायला सांगितली. त्यानंतर ती व्हीलचेअरवरून खिडकीपाशी गेली.

वडील आणि भावाच्या सल्ल्याने तिने शिक्षण सुरू ठेवले होते, सोबतच ती हस्तकौशल्याच्या सुंदर वस्तूही बनवू लागली. निसर्गाने जणू तिच्या पायांतली सर्व ताकद तिच्या हातांना दिली होती. धागे, शिंपले, मोती, तागाच्या साहाय्याने ती सुंदर पिशव्या आणि भिंतीवर टांगायच्या शोभेच्या वस्तू बनवायची.

तिला कामात मदत करायला मालती होतीच, सोबतच त्यांनी एका मुलीला ठेवले होते, जी सामान उचलायला, ठेवायला मदत करायची. मोठमोठया बुटीकमधून ऑर्डर यायच्या. सर्व मिळून त्या वेळेत पूर्ण करत. हळूहळू आयुष्याने पुन्हा वेग पकडायला सुरुवात केली होती.

‘‘आई, तुला माझी खूप काळजी वाटते ना?’’ नीलू गंभीर स्वरात विचारायची.

‘‘नाही, मी कशाला काळजी करू? तू समजूतदार आहेस. स्वत:ची कामे स्वत: करतेस. बुटीकच्या ऑर्डरही घेतेस आणि शिकतही आहेस,’’ मालती तिला नेहमीच प्रोत्साहन देत असे.

‘‘तुझ्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या आणि डोळयांखाली काळी वर्तुळे आली आहेत,  तरीही सांगतेस की, कसलीच काळजी नाही,’’ नीलूचे निळे डोळे मनाचा वेध घेत होते.

मालती नीलूचे कमरेपासून खालचे अवयव स्वच्छ करून तिला कपडे घालायची. ही सर्व कामे एका तरुण मुलीला दुसऱ्याच्या हातून करून घ्याव्या लागणाऱ्या परिस्थितीचा सामना दोघीही रोजच करत होत्या.

अचानक चिवचिव आवाजासोबत कावकावचा आवाज आला.

‘‘ते बघ आई. नीलोफरच्या घरटयात ३-४ कावळे एकत्र आलेत. तिला त्रास देत आहेत. आई, नीलोफरला, तिच्या अंडयांना वाचव,’’ नीलूच्या आवाजात वेदना होत्या, जणू कोणीतरी तिच्यावरच हल्ला करत होता.

मालती स्वयंपाकघरातून धावतच खिडकीपाशी आली. तिने नीलूकडे पाहिले. ती घामाघूम झाली होती.

‘‘आई, हे कावळे तिला मारून टाकतील. जसे तू मला वाचवलेस तसे कृपा करून तिलाही वाचव आई…’’ नीलूचा आवाज जणू खोल विहिरीतून बाहेर यायचा प्रयत्न करत होता. एक अंधार ज्यात ती स्वत: जगत होती, एक शांतता जिला ती स्वत: तोंड देत होती. दूरवर आशेचे क्षितिज होते, पण ते मुठीतून निसटायला सदैव आतूर असायचे.

‘‘बाळा, प्रत्येकाला स्वत:ची लढाई लढायची असते. दुसरे कोणीतरी थोडी मदत करू शकते, पण आयुष्यभर साथ देऊ शकत नाही,’’ मालतीने नीलूचा हात आपल्या हातात घेतला, ‘‘नीलोफरची लढाई तिची स्वत:ची आहे. तिला शक्ती मिळावी यासाठी आपण फक्त निसर्गाकडे प्रार्थना करू शकतो.’’

‘‘तू त्या कावळयांना हाकलून लावू शकतेस, मी उठून त्यांना मारू शकत नाही,’’ नीलूचा आवाज थरथरत होता.

‘‘आपल्यापेक्षा नीलोफरला तिच्या अंडयांबद्दल जास्त काळजी असेल. ती तिची लढाई कशी लढते ते तू बघच,’’ मालतीने मुलीची समजूत काढली, पण तिचा एका लहान पक्ष्याच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे तिने आतून एक मोठे लाकूड आणले.

‘‘समोरचे दृश्य पाहून ती आश्चर्यचकित झाली. एकटी नीलोफर आत्मविश्वासाने ४ कावळयांशी लढत होती. आपल्या लहान पण तीक्ष्ण चोचीने त्यांच्या डोळयांवर हल्ला करून तिने २ कावळयांना पळवून लावले. एक नजर आपल्या अंडयांवर टाकली, पंख फडफडवत स्वत:मधील ताकद एकवटली, पण हे काय…? तिची २ निळी पिसे गळून पडली.

गळून पडलेल्या पिसांवर एक नजर टाकून तिने जोरात चिवचिवाट केला आणि उरलेल्या दोन्ही कावळयांवर ती हल्ला करू लागली.

आपला श्वास रोखून धरत खिडकीतून मालती आणि नीलू त्या छोटयाशा चिमणीला प्रोत्साहन देत होत्या. पक्षी मन वाचतात, जे तोंड असूनही माणसाला समजू शकत नाही. त्या ४ धाडस वाढवणाऱ्या डोळयांनी नीलोफरला लढण्याचे बळ दिले.

हवेत झोपावून ती सतत तिच्या चोचीने हल्ले करत राहिली. कावळयांच्या मोठया, जाड चोचीपासून स्वत:चे संरक्षण करणे थांबवून ती अधिक आक्रमक झाली.

अखेर एका आईसमोर पराभूत होऊन दोन्ही कावळे पळून गेले. दीर्घ श्वास घेत नीलोफरने तिच्या घरटयातल्या सुरक्षित अंडयांकडे प्रेमाने पाहिले. तिची नजर खिडकीपाशी थांबली, जिथे दोघीही टाळया वाजवून तिचे कौतुक करत होत्या.

नीलोफर तिच्या जखमी शरीराकडे पाहू लागली. कावळयांनी चोच मारल्यामुळे शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. तिचे तेजस्वी निळे पंख गळून पडले होते. त्याचे दु:ख तिच्या डोळयांतून जाणवत होते.

‘‘नीलोफर, तू जगातली सर्वात सुंदर चिमणी आहेस. तुला निळया पिसांची गरज नाही. आज तुझे सौंदर्य मी प्रत्यक्ष अनुभवले आहे,’’ नीलूचे शब्द त्या चिमुकल्या पक्ष्याला किती समजले माहीत नाही, पण ती आनंदाने चिवचिवाट करू लागली.

नीलूने वळून मालतीकडे पाहिले. आता तिच्या डोळयांखाली काळेपणा नव्हता, तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत नव्हत्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें