* पद्मा अग्रवाल

इला पेशाने इंजीनिअर आहे. सकाळी वर्तमानपत्रातील मथळयांवर वरचेवर नजर मारून राशीभविष्य पाहण्यास ती विसरत नाही आणि मग त्यात काय लिहिले आहे त्यावरूनच तिचा मूड तयार होतो किंवा बिघडतो. राशीभविष्यात जर प्रिय व्यक्तिशी तणाव निर्माण होईल, असे असल्यास ती कधी पती तर कधी इतरांवर रागावते. तुमचे ग्रह शुभ परिणाम देणार आहेत, असे लिहिलेले असल्यास दिवसभर आनंदाची बातमी ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहात, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याच्याशी जोडत असते.

कुहू काळया रंगाचा गाऊन घालून आत्याच्या मुलाच्या लग्नाला गेली होती. सर्वांनी खूपच छान असे म्हणत तिला खुश केले. पण आत्याच्या जावेला तिने परिधान केलेला काळा रंग अजिबात आवडला नाही. ती सर्वांसमोर खोचकपणे बोलली, ‘‘लग्नाला आली आहेस, दुखवटयाला नाही, मग काळा गाऊन का घातलास.’’

कुहूच्या डोळयात पाणी आले. आत्या सर्व सावरून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या जावेच्या डोळयात प्रचंड राग होता.

जीवनावरील संकट

एकविसाव्या शतकात, अंधश्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांसाठी एक आव्हान आहे. अंधश्रद्धेमुळे बुराडी कांडात हसत्याखेळत्या ११ लोकांचे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले. याआधी महाराष्ट्रातील हसनैन वरेकर कांडात एकाच कुटुंबातील १४ जणांना मृत्यूच्या दाढेत ढकलले होते.

अंधश्रद्धेचे मूळ कारण पुजाऱ्यांचा प्रचार आहे, जो आता इंग्रजीत विज्ञानाच्या सोबतीने भविष्याची भीती दाखवत चांगले वर्तमान मिळवून देण्याचा दावा नेत्यांप्रमाणे करत आहे. उद्या काय होईल, कोणालाच माहिती नसते. आपल्या मनाप्रमाणे घडावे यासाठी लोक कोणीही सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागायला तयार होतात.

अंधश्रद्धा ही अज्ञानाची, भीतिची, निराशेची आणि खेदाची बाब आहे की ज्यामुळे सुशिक्षित लोकही वास्तावाकडे दुर्लक्ष करून अंधश्रद्धेच्या जाळयात अडकतात. अंधश्रद्धेचा प्रसार पुजाऱ्यांपेक्षा त्यांचे भक्तच अधिक करतात.

टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मिडिया ही दोन्ही अंधश्रद्धेची मुळे मजबूत करण्यात गुंतले आहेत. ते अंधश्रद्धा पसरवण्याचे शक्तिशाली माध्यम बनले आहे.

हा संदेश १० लोकांना फॉरवर्ड करा…मनातली इच्छा पूर्ण होईल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या साइट्सवर अशा संदेशांचा पूर आला आहे.

कधी गणपतीने दूध पिण्याची, तर कधी रात्री कुणी वेणी कापत असल्याची बातमी, जगात आपल्या देशाची प्रतिमा मलिन करीत आहे. कधी दिवसानुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याचा आदेश दिला जातो. आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, परंतु महिला करवा चौथला चंद्र पाहण्यासाठी नटूनथटून दिवसभर उपवास करतात.

काही दिवसांपूर्वी वडिलांचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी १३ वर्षांच्या मुलीला ६८ दिवस उपवास करायला लावले. व्यवसायाचे तर माहीत नाही, पण यामुळे मुलीला मात्र जीव गमवावा लागला.

कायदेशीर गुन्हा

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासंदर्भातही आपल्या देशात अंधश्रद्धा आहेत. ग्रहण काळात स्वयंपाक करणे, खाणे, पूजा आदी निषिद्ध मानले जाते. ग्रहणानंतर वाराणसी, हरिद्वार इत्यादी ठिकाणी स्नानासाठी लोकांची गर्दी होते. एलडस हक्सले यांनी अशीच गर्दी बघून सांगितले होते की ‘‘सूर्याला राहूपासून मुक्त करण्यासाठी जितके लोक जमतात, तितक्याच मोठया संख्येने शत्रूच्या तावडीतून भारताला मुक्त करण्यासाठी भारतीय जमू शकत नाहीत.’’

ही टिप्पणी आपल्यासाठी त्रासदायक असली तरी हे सत्य आहे आणि त्याचे कारण पुजाऱ्यांनी प्रचाराची मर्यादा ओलांडणे हे आहे.

मुलाचा जन्म, लग्न असो, गृहप्रवेश किंवा भूमिपूजन, लोक शुभमुहूर्त काढण्यासाठी पुजाऱ्यांकडे धाव घेतात. पुजारी सर्वात आधी आपली सोय पाहून त्यानंतरच शुभमुहूर्त सांगतात. विशेष धातू किंवा रत्नांची अंगठी घालणं, मंतरलेलं ताईत घालणं, जादूटोणा, घर बनविताना काळी हंडी टांगणं अशा अनेक अंधश्रद्धा पूर्वीप्रमाणेच त्यांची पकड घट्ट करीत आहेत.

टीव्ही वाहिन्यांवरील जाहिराती लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत आहेत, जसे की गोरे बनविण्याची क्रीम.

अलाहाबाद उच्च न्यायालयानेही आपल्या निकालात असे म्हटले आहे की तंत्रमंत्र, जादूटोणा, ताईत, प्रार्थना आणि धर्मावरील विश्वासाचा अतिरेक कायदेशीर गुन्हा आहे, परंतु कोर्टाचे म्हणणे कोण ऐकतो?

पुजाऱ्यांनी तयार केलेला प्रपंच

अंधश्रद्धा हा देशाच्या विकासात अडथळा ठरत आहे. यामुळे लोक आर्थिक आणि सामाजिक शोषणाला बळी पडत आहेत. हे विज्ञान युग आहे. अशावेळी  टीव्हीवरील वाहिन्यांवर ‘नजर सुरक्षा कवच’, ‘सिद्धमाला’, ‘सिद्ध रिंग’, ‘धनप्राप्ती यंत्र’ आदींचा धंदा अंधश्रद्धेच्या नावाखाली चालविला जात आहे.

जादूटोणा, भूतप्रेत, चेटूक, तंत्रमंत्र हे केवळ दुर्बल मेंदूतून जन्माला येते. प्रत्येक घटनेमागे एक कारण असते.

काही अंधश्रद्धांमागे वैज्ञानिक कारणंही दिली जाऊ लागली आहेत, जी सुशिक्षितांना मूर्खाप्रमाणे वागायला भाग पाडतात. तसे तर हा पूर्वनियोजित व्यवसायाचाच एक भाग आहे.

दरवाजावर लिंबूमिरची टांगा, लिंबातील सायट्रिक अॅसिड कीटकनाशकाचे काम करते, जे कीटकांना आत येण्यापासून रोखते.

कुंडली जुळविणे हा फक्त पुजाऱ्यांनी थाटलेला प्रपंच आहे. मंगळ दोष निवारणाचा उपायही अंधश्रद्धाच आहे. फिल्मी जगतातील शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायसारख्या विश्वसुंदरीसह आपला मुलगा अभिषेक बच्चन याचे लग्न लावून देण्यापूर्वी ऐश्वर्याने वडाच्या झाडासोबत फेरे घेणे हे अंधश्रद्धेचेच ज्वलंत उदाहरण आहे.

ही अंधश्रद्धा व्यवसायाचा भाग आहे. जसे पोथी-पुराणात असायचे तसे आता नेट व टीव्हीद्वारे होते. मात्र साधू, पुजाऱ्यांना दान देणे, त्यांचे रक्षण करणे कायम आहे.

धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिकता

एमबीए पदवीधर असलेली ५० वर्षांची अस्खलित इंग्रजी बोलणारी फरजाना हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून हैदराबादमधील दर्ग्यात राहत आहे.

तिचा ठाम विश्वास आहे की तिचे कुटुंब तिच्यावर काळी जादू करीत आहे. दर्ग्यात राहिल्यामुळे ती या जादूपासून वाचेल.

मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय अंजलीचे एका मुलावर प्रेम होते. पण आईला त्यांचे नाते मान्य नव्हते. त्यासाठी ती तांत्रिकाला शरण गेली.

तांत्रिक प्रत्येक वेळी मनगटावर धागा बांधण्याच्या बदल्यात तिच्या आईकडून ५ हजार रुपये घेत असे. त्याचे म्हणणे होते की तिने आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न केल्यास भविष्यात तिच्यावर खूप मोठे संकट ओढवेल. या धाग्याच्या प्रभावामुळे ती तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न करू शकणार नाही.

काही दिवसांनंतर अंजलीने धागा काढून फेकून दिला व आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न केले. आता ती खूप आनंदात आहे.

‘वशीकरण’ वेबसाइट चालविणारे कोणत्याही समस्येचे समाधान करू असा दावा करतात. तेथील तथाकथित ज्योतिषाशी मी फोनवर संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही आधी आमच्या खात्यात पैसे जमा करा, त्यानंतर इ-मेलद्वारे समस्या सांगून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता.’’

मी प्रेसमध्ये काम करते, असे सांगताच त्यांनी लगेच फोन कट केला.

प्रशासनातील लोकच धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिक धोरणांत गुंतले आहेत, त्यामुळे समाजातील परिवर्तनाची प्रक्रिया मंदावणार, हे निश्चित आहे.

छळ व हत्या

बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आजही ‘चेटकीण’ या  नावाखाली महिलांचा छळ व हत्या केल्याच्या बातम्या येतच असतात.

रायपूरचे डॉ. दिनेश मिश्र पेशाने नेत्र विशेषज्ज्ञ आहेत. गावकऱ्यांशी संपर्क साधल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की छत्तीसगडमधील काही लोक ज्यांना ओझा असे म्हटले जाते, ते भोळयाभाबडया गावकऱ्यांना आपल्या शब्दांच्या जाळयात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यांना फसवितात. त्यांनी सांगितलेकी त्यांच्याकडे सतत तक्रार यायची की गावात एखाद्या महिलेला ‘चेटकीण’ ठरवून तिला छळले जाते. सोबतच तिचे गावातील अन्नपाणी बंद करून तिला समाज आणि गावाबाहेर काढले जाते. यामुळे गावात अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण होते.

डॉ. मिश्र यांचे प्रयत्न आणि शिफारशींमुळे झाडणे, जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवून एखाद्याला वाळीत टाकणे याला अपराध ठरविण्यात आले.

डॉ. दिनेश मिश्र अंधश्रद्धेविरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’द्वारे गावागावांत जाऊन लोकांमध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे १,३५० सभा घेतल्या आहेत.

त्यांच्याच अथक परिश्रमांमुळे २००५ मध्ये ‘छत्तीसगड जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ तयार करण्यात आला. त्याअंतर्गत अशा प्रकरणांमध्ये ३ वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

२००७ मध्ये त्यांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

अंधश्रद्धेरूपी व्यवसायाची भूमी ही राजकीय पाठिब्यांच्या खतामुळे भरभराटीस येते. या दोघांच्या हातमिळवणीमुळे मिळणारा नफा राजकारणी आणि प्रसारमाध्यमे आपापल्या स्वार्थासाठी स्वत:ला हवा तसा वापरतात.

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हा प्रश्न गंभीर झाला आहे की सरकार अंधश्रद्धेविरूद्ध कठोर कायदे का करीत नाही?

विज्ञानाला देवाप्रमाणे सादर करणारे अमेरिका, ब्रिटन हे युरोपीय देश असोत, जादू, तंत्रमंत्राला कुप्रथा म्हणविणारे अरब देश असोत अथवा आपल्याच देशात जादूटोणा, चमत्कार किंवा मनातली इच्छा पूर्ण करणारे असोत, प्रत्येक ठिकाणी अशा लोकांची मोठी जमातच पाहायला मिळते.

ती कॅन्सरसारख्या आजारांना बरे करण्यासोबतच लग्न, प्रेम, व्यवसायात भरभराट, एखाद्याला वश करणे, शत्रूचा नाश करणे इत्यादींसाठी त्यांचे नेटवर्क देशातील प्रत्येक राज्यात, शहर आणि खेडयात चालवत आहे. सोबतच आता हा व्यवसाय ऑनलाइनही करीत आहेत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...