कथा * पूनम पांडे

‘‘कोणीतरी किती खरे सांगितले आहे की, जे नाते निर्माण व्हायचे असते ते जन्माला येतेच. नियतीमागे दडलेले रहस्य कोण समजून घेऊ शकले आहे? ती असा काही खेळ खेळते की, दोन अनोळखी व्यक्तींची एखाद्या वळणावर अगदी सहज भेट घडते.’’

ते दोघेही जवळपास महिनाभरापासून एकमेकांना ओळखत होते. रोज संध्याकाळी आपापल्या घरातून फिरण्यासाठी बाहेर पडत आणि पार्कमध्ये बसून गप्पा मारत.

आजही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसतच एकमेकांना नमस्कार केला.

‘‘काय मग, आज सकाळपासूनच सर्व व्यवस्थित घडले ना?’’

रमाजींनी विचारले असता रमणजींनी होकारार्थी उत्तर दिले.

आणि त्यानंतर दोघांमध्ये त्या विषयाला धरून गप्पा सुरू झाल्या.

रमा त्यांच्यापेक्षा ५ वर्षांनी लहान होत्या. तरीही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून स्वत:चे मत मांडत असत.

रमणजींनी त्यांना सांगितले होते की, ते कुटुंबात खुश नाहीत. कारण सर्व स्वत:चाच विचार करतात. प्रत्येकाचे स्वत:चे असे वेगळे जग आहे आणि ते त्या जगामध्येच रमतात.

रमणजींचा स्वभावच असा होता की, जेव्हा ते गप्पा मारू लागत तेव्हा बाबा-बुवांसारखे बोलत. ते विचारत, रमाजी, ‘‘तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा त्या लगेचच म्हणत, ‘नाही माहीत… नाही,’ जर माहीत आहे असे म्हटले तरी ते न हसता धीरगंभीरपणे स्वत:ला जे वाटत असे तेच बोलत, ‘‘या जगात पुण्याची दोनच फळे आहेत – एक म्हणजे तुम्हाला जे हवे असेल ते न मिळणे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मिळणे.’’

हे ऐकून रमाजी भरपूर हसायच्या. ते पाहून रमणजी आपल्या बोलण्याचा अर्थ अधिक स्पष्ट करीत सांगायचे की, ‘‘देवाच्या चरणी लीन होताच लाखमोलाचे समाधान मिळते. परमात्म्यात रमणाऱ्या मनाला आणि तीर्थक्षेत्री दान करणाऱ्यांना सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्याचे उत्तर मिळतेच.’’

‘‘आणि हो, रमाजी नीट ऐका, हे जे आयुष्य आहे ते कितीही मोठे असले तरी नास्तिक झाल्यास आणि त्या परमात्म्याला विसरल्यास छोटेही होऊ शकते.’’

हे सर्व ऐकल्यावर रमाजी आपले हसणे लपवत विचारायच्या, ‘‘हो का? मग तुमचा आश्रम कुठे आहे, जेथे दीक्षा घेता येईल?’’

हे ऐकल्यावर रमणजी बरेच गंभीर आणि उदास होत. त्यावेळी त्यांचे मन बदलण्यासाठी त्या म्हणत की, ‘‘गुरुजी, जो तुमको हो पसंद वही बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो तो रात कहेंगे…‘‘

वरील गाण्यात नायकाला नायिकेला काय सांगायचे आहे? थोडक्यात भावार्थ सांगा रमणजी…

रमणजी हे ऐकून गोंधळून जात. ते खूप विचार करीत असत, पण त्यांना काय उत्तर द्यायचे तेच समजत नसे.

काही वेळानंतर रमाजी स्वत:हून सांगत, ‘‘रमणजी, या गाण्यात नायक हा नायिकेला सांगत आहे की, ठीक आहे. तू म्हणशील तसे. तुझ्या पुढे कोण डोकेफोड करेल?’’

त्यानंतर दोघेही जोरजोरात हसत.

बऱ्याचदा रमणजी उपदेशाचे डोस देत. ते सांगत, माझ्या मनात दैवी प्रेम ठासून भरले आहे आणि मी तुम्हाला हा सल्ला यासाठी देत नाही की, मी खूप समजूतदार आहे, तर यासाठी देतोय की, मी तुमच्यापेक्षा जास्त चुका केल्या आहेत. शिवाय हा मार्ग निवडल्यामुळेच मला शांतता लाभली आहे.

अशा वेळी रमाजीही एखाद्या पुरोगामी विचारवंताच्या प्रतिनिधी असल्याप्रमाणे सांगत की, ‘‘रमणजी, आपला स्वत:वरचा विश्वास ३ गोष्टींवर आधारित असतो. आपली सारासार विवेकबुद्धी, आपल्यावरील सामाजिक दडपण आणि स्वत:वरील नियंत्रणाचा अभाव.’’

‘‘आता यापैकी मला जी गोष्ट महत्त्वाची वाटत होती ती मी निवडली आहे आणि त्यामुळेच आनंदी आहे. आता ती गोष्ट कोणती,’’ हे समजूतदार व्यक्ती समजून गेली असेल. एवढे सांगूनही रमाजींना नेमके काय सांगायचे आहे, हे रमणजींना समजत नसे.

रमणजींचे असे उपदेशपर बोलणे ऐकून सुरुवातीला रमाजींना असे वाटायचे की, कुठल्यातरी मोठया सनातनी समाजाचे ओझे ते वाहत आहेत. जीवनात खूप काही सहन करावे लागले असेल, त्यामुळे आता निराशेने त्यांना घेरले आहे.

त्यानंतर एके दिवशी रमा यांनी मोकळेपणाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, नेमके प्रकरण काय आहे? रमा त्यांना म्हणाल्या, मी वयाची ६० वर्षे पूर्ण करणार आहे. हो का? मी ६५, असे म्हणून रमणजी हसले.

‘‘मला असे सांगायचे आहे की, माझा मुलगा, सून मला तरुण म्हातारी म्हणतात,’’ असे रमाजींनी हसत सांगितले.

‘‘बरं… बरं…,’’ रमणजींनी मान डोलावत म्हटले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.

‘‘मला हे जाणून घ्यायचे आहे की, तुम्हाला कोण त्रास देत आहे, ज्यामुळे तुम्ही सतत दु:खी असता?’’ रमाजींनी गंभीर होत विचारले.

रमाजींमध्ये खूपच आपुलकी होती. त्या रमणजींसोबत नेहमी आपलेपणाच्या भावनेतूनच बोलत.

हेच कारण होते ज्यामुळे रमणजींनी कुठलाही संकोच न बाळगता त्यांना सर्व काही सांगितले. बस कंडक्टर म्हणून मी सेवानिवृत्त झालो. एकुलत्या एका मुलाला तो ५ वर्षांच्या असल्यापासून एकटयाने सांभाळले. सिगारेट, दारू, सुपारी, पान, तंबाखू यापैकी कसलेच व्यसन कधीही केले नाही.

मागच्या वर्षीच मुलाचे लग्न झाले. आज परिस्थिती अशी आहे की, तो आणि त्याची पत्नी स्वत:च्या संसारात मग्न आहेत. सून एका स्टोअर्सचे काम सांभाळते तर मुलाचे बूट, चपलांचे दुकान आहे. दोघांचे स्वत:चे असे काम आहे आणि ते अगदी व्यवस्थित सुरू आहे.

‘‘बरं, असे आहे तर. आपल्याला कुणीच विचारत नाही, असे तुम्हाला वाटतेय ना?’’ रमाजींनी विचारले.

‘‘आता तर तुम्हीही माझी जास्त विचारपूस करणार नाही, कारण मी बस कंडक्टर होतो, हे तुम्हाला समजले आहे,’’ रमणजी पुन्हा निराश झाले.

त्यांच्या अशा बोलण्यावर रमाजी हसल्या आणि म्हणाल्या, कुठलेच काम छोटे नसते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी निराशेला आमंत्रण देऊ नका. तिच्यामुळे माणूस थकून जातो आणि हाच थकवा तुमची इच्छा नसतानाही अनेक आजारांचा शिरकाव तुमच्या शरीरात सहजपणे करतो.

‘‘तुम्हाला माहीत नाही, पण मीही तुमच्यासारखीच आहे. तरीही अशा प्रकारे आपुलकीने, निर्मळ मनाने वागते की त्यामुळेच माझा मुलगा, सून माझ्यावर खूप प्रेम करतात.’’

‘‘मी वयाच्या २०व्या वर्षी प्रेम विवाह केला होता. वयाच्या २२व्या वर्षी पतीला त्याच्या प्रेयसीकडे सोडून मी माझ्या मुलाला घेऊन ते घर सोडले. त्यानंतर त्या धोकेबाज नवऱ्याच्या आयुष्याचे काय झाले? त्याच्या किती प्रेमिका होत्या? त्याने किती जणींचे आयुष्य खराब केले? या सर्वांचा मी कधीच मागे वळून विचार केला नाही.

‘‘मी आईवडिलांकडे राहू लागले. वयाच्या २२व्या वर्षापासून मुलाच्या संगोपनासह काटकसर करून पैसे जमा करण्यावर मी माझे लक्ष केंद्रित केले.

‘‘माझा मुलगा सरकारी शाळा आणि महाविद्यालयात शिकला. आता तो एक शिक्षक आहे आणि खूपच सुखी आहे.

‘‘हा, तर मी सांगत होते की, माझ्या आईच्या बागेत आंब्याची ५० झाडे आहेत. ५० फणसाची आणि तितकीच जाम आणि आवळयाची झाडे आहेत. मी त्यांची राखण करायची आणि त्या कामसाठी माझे वडील मला दरमहा पैसे द्यायचे.

‘‘माझा मुलगा दहावीत गेला तेव्हा माझ्याकडे २० लाख रुपये जमले होते. माझा भाऊ, वहिनीने मला कधीच कुठे जाऊ दिले नाही.

‘‘माझ्या प्रेमळ, जुळवून घेण्याच्या स्वभावामुळे माझे त्यांच्याशी कधीच भांडण झाले नाही. शिवाय त्यांच्या मुलांना माझ्या मुलाच्या रुपात एक चांगला मार्गदर्शक लाभला होता. काटकसरीमुळे माझ्याकडील जमा केलेले पैसेही वाढतच गेले.’’

‘‘दरम्यान मुलगा नोकरीत कायम झाला आणि त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही येथे या सोसायटीत राहायला आलो. गेल्या वर्षीच माझ्या मुलाचे लग्न झाले.

‘‘साठवलेले पैसे आणि त्यासाठी केलेली काटकसर यामुळेच आज मी करोडपती आहे. तरी अजूनही साधेपणाने राहते. माझी सर्व कामे मी स्वत:च करते आणि कधीच उदासपणे राहत नाही.

‘‘पण तुम्ही छोटयाशा गोष्टींमुळेही उदास होता. इतक्या दिवसांपासून तुमची व्यथा ऐकल्यानंतर मला असे वाटते की, तुमच्यावर खूपच अत्याचार होत आहे. तुम्ही जर असेच सतत दु:खी राहिलात तर लवकरच जगाचा कायमचा निरोप घ्याल.

‘‘तुम्ही काहीही घडले तरी स्वत:ला त्रास करून घेता, ते पाहून मला खूपच वाईट वाटते. हे पहा, मला एक छान कल्पना सुचली आहे…

‘‘तुम्ही एक काम करा… मी काही दिवसांसाठी तुमच्या घरी येते. तेथील वातावरण बदलण्याचा प्रयत्न करते. मी कुठेही गेले तरी तेथे सामंजस्याचे वातावरण निर्माण करते. लग्नानंतरची तब्बल २० वर्षे मी आईच्या घरी दिवस काढले आहेत.

‘‘पण, असे कसे तुम्हाला माझ्या घरी नेऊ..? काहीतरी कारण सांगावे लागेल ना? मी त्यांना काय सांगू?’’ रमणजींनी विचारले.

‘‘अहो, फारच सोपे आहे. मी काय सांगतेय ते नीट ऐका. आज तुम्ही मनगटावर पट्टी बांधून घरी जा. अचानक हात सून्न झाला आहे. कोणीतरी आधार देणारा हवा आहे, जो माझ्या हाताची काळजी घेईल, असे घरच्यांना सांगा.’’

‘‘त्यानंतर मी तुमच्या मित्राची नातेवाईक आहे, म्हातारी आहे, पण प्रामाणिक आहे. माझी काळजी घेईल, असे त्यांना पटवून द्या. तेही विचार करतील की, बरे झाले फुकट कोणीतरी काम करायला मिळाले.’’

‘‘प्रयत्न करून पाहतो,‘‘ रमणजींनी सांगितले आणि जवळच्या मेडिकलमधून हाताला बांधण्यासाठी पट्टी घेतली. त्यानंतर घरी जायच्या गल्लीत वळाले.

रमणजींचे बोलणे घरच्यांना पटले. आठवडाभराची तयारी करून रमाजी त्यांच्या घरी आल्या.

रमाजी येण्यापूर्वी रमनजींच्या मुलगा, सुनेला वाटत होते की, एखादी सर्वसामान्य बाई असेल. प्रत्यक्षात मात्र रमाजींचे आदरणीय, भारदस्त व्यक्तिमत्त्व पाहून दोघांनीही त्यांना वाकून नमस्कार केला.

रमाजींनीही त्यांना अगदी मनापासून आशीर्वाद दिला. त्यांना पहिल्या भेटीतच रमणजींचा मुलगा, सून चांगले वाटले.

असो, प्रत्येकाचे आपले मत असते, असा विचार करून रमाजींनी कुठलाच निष्कर्ष काढला नाही. सर्व काही येणाऱ्या वेळेवर सोडून दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच रमाजींनी घराचा ताबा घेतला. हात खूपच दुखत असल्याचा अभिनय रमणजी चांगल्या प्रकारे करीत होते.

रमाजींना सकाळी लवकर उठायची सवय होती. त्यामुळेच सर्व उठण्याआधीच त्यांची अंघोळ झाली होती. त्यांनी दोनदा चहा घेतला होता. रमणजींनाही दोनदा चहा दिला होता. सोबतच त्यांनी हलवा आणि पोह्याचा नाश्ता बनवून तयार ठेवला होता.

हे पाहून रमनजींच्या मुलगा, सुनेला आश्चर्य वाटले. इतका स्वादिष्ट नाश्ता मिळाल्याने ते खुश झाले. दोघेही कामावर जाताच रमणजी स्वयंपाकघरात रमाजींच्या मदतीसाठी भांडी धुवायला गेले. रमाजी नको म्हणत असतानाही त्यांनी हट्टाने काम केले, कारण त्यांना माहीत होते की, कामवाली बाई ३ दिवस सुट्टीवर आहे. रात्री येताना पावभाजी घेऊन येऊ, असे रमणजींच्या मुलगा, सुनेने सांगितले होते. त्यामुळे रमाजी निश्चिंतपणे इतर कामे करू लागल्या. त्यांनी बटाटयाचे वेफर्स तयार केले. साबुदाण्याचे पापड बनविले आणि झाडाच्या कुंडयांची साफसफाई केली.

एकाच दिवसात रमाजींनी इतकी सर्व कामे केलेली पाहून रमणजींचे कुटुंब आश्चर्यचकित झाले. रात्री सर्वांनी मिळून आंनदाने पावभाजी खाल्ली.

रमणजी आणि रमाजी रोज संध्याकाळी फेरफटका मारायला लांबपर्यंत जात. काही ओळखीच्या लोकांनी त्यांच्याकडे संशयी नजरेने पाहिले, पण त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

अशा प्रकारे आठवडा कधी झाला, हे समजलेदेखील नाही.

रमणजी आणि त्यांच्या मुलगा, सुनेला रमाजींचे खूपच कौतुक वाटत होते. रमाजींनी आणखी काही दिवस रहावे असे मुलगा, सुनेला वाटत होते. ते ऐकून रमणजींचा चेहरा खुलला. त्यांच्या चेहऱ्यावरील उदासपणा दूर कुठेतरी पळून गेला होता. आता मुलगा, सून त्यांच्याशी प्रेमाने बोलू लागले होते. घरातील वातावरण आनंदी झाले होते.

रमाजींचा हेतू साध्य झाला होता. निघताना त्यांना भेट म्हणून काही सिल्कच्या साडया मिळाल्या, कारण त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला होता.

रमाजी तेथून निघाल्या. संध्याकाळी फेरफटका मारायला या, असे निघताना त्यांनी रमणजींना सांगितले. मात्र संध्याकाळी त्या येऊ शकल्या नाहीत.

रमणजींना त्यांनी निरोप पाठवला की, २ दिवसांसाठी त्या सहकुटुंब बाहेर जात आहेत.

रमणजींनी कशीबशी स्वत:च्या मनाची समजूत काढली. त्यानंतर आठवडा उलटला तरी रमाजी आल्या नाहीत. त्यांनी रमणजींच्या एकाही निरोपाला उत्तर दिले नाही.

फोन करणे रमणजींना योग्य वाटत नव्हते. ते मनातल्या मनात विचार करीत होते. महिना उलटला होता. रमणजी वयापेक्षा जास्त म्हातारे दिसू लागले होते. रमाजींनी बनवलेले वेफर्स आणि साबुदाण्याचे पापड खाताना त्यांना असे वाटायचे की, रमाजी येथेच आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.

एका संध्याकाळी निराश होऊन ते फेरफटका मारायला गेले नाहीत. पाहतात तर काय, रमाजी त्यांच्या दरवाजावर उभ्या होत्या. त्यांना आश्चर्य वाटले. तितक्याच त्यांचा मुलगा व सूनही आले. हे पाहून रमणजींना धक्काच बसला. ते ताडकन उठून उभे राहिले.

सुनेने सांगितले की, रमाजी येथे महिनाभर राहतील आणि आम्ही त्यांच्या हाताखालची माणसे बनून राहू.

रमणजींनी कारण विचारले असता सुनेने सांगितले की, तिची छोटी बहीण होम सायन्स शिकत आहे. तिला महाविद्यालयातील अंतिम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका अनुभवी महिलेसोबत रहायचे आहे. आपल्याकडे राहून प्रकल्प पुस्तिका तयार करायची आहे…

‘‘हो का? फारच छान… सूनबाई खूपच चांगला निर्णय,’’ असे बोलताना रमणजींचा चेहरा खुलला होता. पण रमाजींच्या कुटुंबाला याची कल्पना दिलीत ना?

त्यांनी अचानक विचारले. ‘‘त्यांचे कुटुंब नाही म्हणूच शकणार नाही, कारण माझी बहीण आणि रमा मावशी फेसबुकवरील मैत्रिणी आहेत. शिवाय रमाजींच्या कुटुंबाला समाजसेवेची आवड आहे. हो ना, रमा मावशी?

रमणजींच्या सुनेने विचारले. रमाजींनी चांगल्या वागणुकीमुळे आपल्या जीवनात अशी कितीतरी हृदये, कितीतरी मने जिंकली होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...