कथा * रमणी मोटे

हमीसारखंच कार्तिक अन् रोहिणीच्या वादाचं पर्यवसान भांडणात झालं. भांडण थांबवण्याचा उपाय म्हणून कार्तिक गप्प बसला अन् आपल्या खोलीत लॅपटॉप उघडून काम करू लागला.

रोहिणी खूपच उत्तेजित झालेली होती. भांडणाची खुमखुमी मिटलेली नव्हती. त्याच अवस्थेत तिनं काही वेळ हॉलमध्ये फेऱ्या मारल्या अन् एकाएकी ती घराबाहेर पडली.

गेटमधून बाहेर पडतेय तोवर वॉचमन धावत आला, ‘‘मॅडम, कुठं बाहेर निघालात. टॅक्सी मागवू का?’’

‘‘नको, मी जवळच जाऊन येतेय,’’ रोहिणीनं म्हटलं.

रात्रीचे दहा वाजले होते. पण कुलाब्याच्या रस्त्यांवर अजूनही भरपूर वर्दळ होती. दुकानंही उघडी होती. लोक खरेदी करत होते. हॉटेल्स अन् स्वीटमार्टमधूनही लोक गर्दी करून होते.

रोहिणीच्या मनात खळबळ माजली होती. हल्ली जेव्हा जेव्हा रोहिणीचं कार्तिकशी भांडण व्हायचं, तेव्हा विषय नेमका कार्तिकच्या कुटुंबावरच येऊन थांबायचा. कार्तिक त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मोठ्या तिघी बहिणी होत्या. आईवडिलांचा तो लाडका होता तसाच तिघी बहिणींचाही लाडका होता. ही पाच माणसं सतत त्याच्या कौतुकात मग्न असायची.

अर्थात त्याबद्दल रोहिणीची काही तक्रार नव्हती. पण कधीकधी तिला वाटायचं की तिचा नवरा अजूनही अगदी लहानसं बाळ आहे. तो स्वत:च्या मनानं काहीच निर्णय घेऊ शकत नाही. दिवसाकाठी एकदा तरी तो आई आणि बहिणींशी बोलतोच. त्याशिवाय त्याला चैन पडत नाही.

या गोष्टीवरून रोहिणी चिडते तेव्हा तो म्हणतो ‘‘बाबा गेल्यावर मीच त्यांचा आधार आहे. माझ्या जन्मापासून आई आजारी आहे. तिघी बहिणींनीच मला वाढवलं आहे. वडील गेल्यावर परिस्थिती फार बिकट होती. आईनं कसे ते दिवस काढले तिलाच ठाऊक! त्या ऋणातच राहतो मी.’’

तो असा भावनाविवश झाला की रोहिणी गप्प बसते. पण तिला एक गोष्ट समजत नाही…मुलांचं पालनपोषण, त्यांना वाढवणं हे आईबापांचं कर्तव्यच असतं. त्यांनी ते केलं तर त्यात त्यांचे उपकार कसे ठरतात? तिच्याही आईवडिलांनी तिला वाढवलंच ना? पण ती वाद घालत नाही. एरवी तिची कार्तिकबद्दल काहीच तक्रार नाही. तिचं त्याच्यावर प्रेम आहे. कार्तिकही तिच्यावर जीव टाकतो. तो अत्यंत सज्जन माणूस आहे. भरपूर कमवतो. पैशाली तोटा नाहीए. पण त्यांचं प्रेम इतर लोकांमध्ये विभागलं जातंय हेच तिचं दु:ख आहे.

जेव्हा त्यांचं लग्न झालं, तेव्हा कार्तिकनं तिला म्हटलं होतं, ‘‘तू माझा हृदय स्वामिनी आहेस, जिवाची जिवलग आहेस. तुला हवं तसं तू आपलं घर मांड, सजव, हवं तसं चालव…मी तर स्वत:लाही तुझ्या हवाली केलंय. पैसा ही भरूपर देईन. फक्त एकच विनंती आहे, मी माझ्या कुटुंबाशी फार बांधील आहे, गुंतलोय मी त्यांच्यात…आणि म्हणूनच मला वाटतंय की तू ही त्यांच्याशी चांगले संबंध ठेव. त्यांना मान दे, मी माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही आणि माझ्या बहिणींनाही दु:खी बघू शकत नाही.’’

रोहिणीला आठवलं, हनीमूनसाठी ती दोघं सिंगापूरला गेली होती. कित्ती कौतुक केलं होतं कार्तिकनं तिचं. ती अगदी तृप्त तृप्त झाली होती. खूप मजा केली. परतायच्या आदल्या दिवशी ती दोघं बाजारात फिरत असताना कार्तिक एका ज्वेलरी शॉपपाशी थबकला. ‘‘ये ना, इथं जरा बघुयात काय काय आहे.’’ त्यांन तिचा हात धरून दुकानांत प्रवेश केला.

मनातल्या मनात ती सुखावली…कार्तिक तिच्यासाठी दागिना खरेदी करतो बहुतेक.

दोघांनी मिळून बरेच दागिने बघितले. एक नेकलेस उचलून कार्तिकनं म्हटलं, ‘‘हा कसा वाटतोय?’’

‘‘वाह! हा तर फारच सुंदर आहे.’’ आनंदून तिनं म्हटलं.

‘‘तुला नक्की आवडलाय ना? आपल्या हनीमून ट्रिपची आठवण म्हणून घेतोय तुझ्यासाठी.’’ तो प्रेमानं म्हणाला.

‘‘कार्तिक, तुम्ही किती चांगले आहात…’’ ती भारावून बोलली.

‘‘पण खूप महाग आहे…’’

‘‘तू पैशांची काळजी करू नकोस आणि हे बघ, एक एक बरासा नेकलेस माझ्या तिघी बहिणींसाठीही पसंत कर. इथून परत गेल्यावर त्यांनाही माझ्याकडून गिफ्टची अपेक्षा असेलच ना?’’

मध्येच बहिणी आल्यामुळे रोहिणीला मनातून जरा रागच आला होता. पण तसं न दाखवता तिनं विचारलं, ‘‘आणि आईंसाठी?’’

‘‘आईसाठी छानशी शाल घेऊयात…’’ त्यानं म्हटलं.

भरपूर खरेदी करून ती दोघं परत आली. त्यानंतर प्रत्येक सणावारी तो बहिणींना काहीतरी भेटवस्तू पाठवायचाच. जेव्हा ऑफिसच्या कामानिमित्तानं त्याला परदेशी जावं लागायचं, तेव्हा त्याच्या भाचा, भाचींकडून त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची यादी आधीच घरी पोहोचलेली असे. त्याच्या माणसांनी काही म्हणायचा अवकाश की ती गोष्ट तो ताबडतोब करायचा.

खरं तर रोहिणीला याबद्दलही आक्षेप नव्हता. कार्तिक एका आयटी कंपनीत नोकरी करत होता. भरपूर कमवत होता. त्याचं काहीही करायला तो मुखत्यार होता. तिला खटकणारी बाब होती त्याचा वेळ. त्याचा मौल्यवान वेळ जो तिला फक्त स्वत:साठी हवा असायचा, तो वेळ कार्तिक त्याच्या कुटुंबीयांसाठी देत होता. त्याचा वेळ अन् त्याचं प्रेम यात तिला कुणाचाही वाटा नको होता. त्यावर फक्त तिचा अन् तिचाच हक्क आहे असं तिला वाटायचं.

आजचं भांडण त्यावरूनच तर झालेलं. लवकरच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस येणार आहे. रोहिणीच्या मनात होतं यंदा परदेशात कुठं तरी जाऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा. पण कसचं काय? तिच्या भिशी पार्टीतल्या दोन तीन बायका इटलीला जाऊन आल्या अन् सतत तिथली वर्णनं ऐकवतात…किती सुंदर आहे अन् त्यांनी किती मजा केली…ते ऐकून ऐकून रोहिणीचे कान किटले होते. तिच्या एक दोन मैत्रिणींचे नवरे अरबपती होते. त्या तर सतत पैसे खर्च करून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायच्या. रोहिणीला त्यांचा फार हेवा वाटायचा.

यंदा तिनं बऱ्याच शर्थीनं कार्तिकला तयार केलं होतं की ती दोघं इटलीला जातील. मनसोक्त पैसा खर्च करायचा, चैन चंगळ करूनच परतायचं.

मनातल्या मनात तिनं किती तरी वेळा चित्र रंगवलं होतं की फ्रेंच शिफॉनची देखणी साडी नेसून महागातल्या परदेशी परफ्यूमचा फवारा अंगावर मारून परदेशी चॉकलेटचा मोठा डब्बा हातात घेऊन ती भिशीपार्टींला गेली आहे…सगळ्या जणी मनातून खूप जळताहेत, हेवा करताहेत पण वरकरणी तिचं कौतुक करताहेत.

पण आज जेवण झाल्यावर जेव्हा तिनं हा विषय काढला, तेव्हा कार्तिक म्हणाला, ‘‘यावेळी बाहेर जाणं मला अवघडंच वाटतंय…’’

‘‘का?’’

‘‘अगं, सगळ्यात मोठी माझी शकुंतला अक्का…तिच्या थोरल्या मुलीचं लग्न ठरलंय ना? तुला सांगितलंही होतं मी…तर आजच सकाळी तिचा फोन आला की एवढ्यातच त्यांच्याकडे साखरपुडा समारंभ आहे आणि आपलं तिथं जाणं फारच गरजेचं आहे. शेवटी मीच एकुलता एक मामा आहे ना? मला पुढाकार घ्यायला हवा.’’

‘‘तुमच्या घरात तर सतत काही ना काही चालूच असतं.’’ ती जरा चिडून म्हणाली, ‘‘कधी कुणाचं बारसं, कुणाचा वाढदिवस, कुणाचं जावळ अन् काय न् काय!’’

‘‘अगं, लग्नाचा वाढदिवस तर दरवर्षीच येतो ना? लग्नं दरवर्षी होतात का? अक्कानं खूप बजावून अन् आग्रहानं बोलावलंय…कुठलीही सबब तिला चालणार नाहीए.’’

‘‘मला एक सांगा, आपण आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे कधी जगूच शकणार नाही का?’’

तिचा संताप बघून तो शांपतपणे म्हणाला, ‘‘डार्लिंग, अशी चिडू नकोस. अगं, मॅरेज एनव्हसरी साजरी करायला आपण पुढल्या वर्षी जाऊयात ना? आत्ताच ठरवं, कुठं जायचं. किती रहायचं…मी सगळं प्लॉनिग तुझ्यावर सोपवतो.’’

‘‘हो…हो…तर…फारच उपकार आहेत तुमचे. मी सगळा प्लॅन ठरवेन अन् तुमच्या बहिणीचा फोन आला की सगळंच ओम फस्स! सगळं सगळं कॅन्सल!!’’

‘‘अगं, नेहमी असं होतं का?’’

‘‘होतं…नेहमीच असं होतं…आमचं स्वत:चं म्हणून काही आयुष्य नाहीए आम्हाला.’’

‘‘तू उगीचच चिडते आहेस. तुला कधी काही कमी पडू दिलंय का मी? तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, तुझे सगळे हट्ट पुरवतो.’’

‘‘त्यात काय मोठंसं?… ते तर सगळेच नवरे करतात…पण तेच नवरे जे बायकोबरोबर खरोखर प्रेम करतात.’’

‘‘म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी तुझ्यावर प्रेम करत नाही?’’ कार्तिकनं रोहिणीच्या डोळ्यात रोखून बघत विचारलं.

‘‘वाटतं तर तसंच.’’

‘‘रोहिणी, हे मात्र तू अति करते आहेस. तुलाही ठाऊक आहे, माझं तुझ्यावरचं प्रेम बघून माझे मित्र मला चिडवतात, बायकोचा गुलाम म्हणतात.’’

‘‘ते असं म्हणतात? नवल आहे…इथं तर माझे कोणतंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. मी काही म्हटलं की ‘आता जमणार नाही?’ हेच मला ऐकवलं जातं…खरं तर तुम्हाला ‘आईचं बाळ’ किंवा ‘बहिणींचा आज्ञाधारक भाऊ’ म्हणायला हवं.’’

कार्तिक खळखळून हसला, ‘‘तू म्हणजे ग्रेट आहेस.’’ एवढं बोलून त्यानं रोहिणीला गालावर प्रेमानं थोपटलं अन् टीव्ही. ऑन केला.

रोहिणी अजूनही भुणभुणत होती. तिला हा विषय उद्यावर ढकलायचा नव्हता. जो काही निर्णय असेल तो आजच, आत्ताच व्हायला हवा. म्हणून पुन्हा तिनं विचारलं, ‘‘तर मग, काय ठरवलंय तुम्ही?’’

‘‘कशाबद्दल?’’ अगदी सहज आश्चर्यानं कार्तिकनं विचारलं.

‘‘हे घ्या! मघापासून मी काय बोलतेय? निरर्थक बडबड वाटली का तुम्हाला? आपण इटलीच्या टूरवर जातो आहोत की नाही?’’

‘‘सांगितलं ना, की यावेळी जरा अवघड आहे…तुमला माहीत आहे. मला सुट्टया फार कमी असतात. यावेळी लग्नाला जायला हवं. पुढल्या वर्षी इटली…अगदी नक्की!’’

‘‘अजिबात नाही…असली पोकळ आश्वासनं मला नको आहेत.’’

‘‘अगं, हे बघ, पुढल्या वर्षीही इटली तिथंच असणार आणि आपण दोघंही तिथं जाणार…’’

‘‘हो, आणि तुमचं कुटंबही इथंच असणार अन् त्यांचे काही तरी कार्यक्रमही मध्येच उपटणार!’’

‘‘कधी कधी तू फारच बालिशपणा करतेस…’’

‘‘हो, हो, आहेच मी मूर्ख, अक्कलशून्य, स्वार्थी, आप्पलपोटी, सगळे, सगळे दुर्गुण ठासून भरले आहेत माझ्यात.’’

‘‘यावेळी तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही. आत्ता तू संतापलेली आहेस, उद्या शांत डोक्यानं ठरवूयात. मी जरा माझं ऑफिसचं काम संपवतो.’’ एवढं बोलून कार्तिकनं त्याचा लॅपटॉप ऑन केला.

रोहिणीच्या मनासारखं न झाल्यामुळे ती धुमसत होती. थोड्याच वेळात ती घराबाहेर पडली.

अजूनही रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती. सिनेमा थिएटर दिसताच तिला वाटलं तिकिट काढून आत जावं, दोन तास मजेत जातील. पण तेवढ्यात विचार आला की ती घरात नाही हे बघून कार्तिक काळजी करेल. तिला शोधेल…इथे, तिथे फोन करेल…तिनं बेत बदलला. गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेनं चालू लागली.

खूप लोक समुद्रकाठी बसून गप्पा मारत वाऱ्याच्या झाळुकींचा आनंद उपभोगत होते. रोहिणीही तिथंच बसली. दृष्टी पार समुद्राच्या अंतावर स्थिरावली होती.

समुद्रात दोन तीन जहाजं नांगरून पडलेली…त्यांच्या वरचे दिवे समुद्राच्या पाण्यात विलोभनीय दिसत होते. रोहिणीला वाटलं, सरळ समुद्रात उडी घ्यावी. काही क्षणांत तिचं आयुष्य संपेल.

मग तिला मन:चक्षुसमोर दृष्य दिसलं. तिच्या निर्जीव देहाला कवटाळून कार्तिक आक्रोश करतोय. म्हणतोय, तू इतकी रागावशील, मला वाटलंच नव्हतं. मी तुझे म्हणणं मान्य केलं असतं तर तू मला अशी एकट्याला टाकून गेलीच नसतीस…

पण छे! जीव बीव नाही हं द्यायचा. अजून काहीच जग बघितलं नाही अन् एवढं काय घडलंय की जीव द्यावा? ठीक आहे, नवऱ्याशी भांडण झालंय, पण ते तर सगळ्याच नवरा बायकोत होतं, तो वैवाहिक जीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. कधी भांडण, कधी प्रेम, खरं तर तिच्या आयुष्यात प्रेम आणि सुखंच जास्त आहे. दु:ख खरं तर नाहीच, पण तिच्या आठमुठेपणामुळे ती दु:खी होते.

कधीकधी कार्तिकही अडून बसतोच ना? त्यावेळी तिला खूप राग येतो. त्यावेळी ती फार उत्तेजित होते…विचलित मन:स्थितीत तिला काय करावं ते समजत नाही. मग असं काहीबाही मनांत येतं. लग्नाला चार वर्षं झालीत. अजून मूलबाळ नाही…कदाचित त्यामुळेच तडजोड करणंही जमत नसेल…

विचारांच्या तंद्रीत किती वेळ गेला तिला कळलंच नाही. ती भानावर आली तेव्हा तिच्या जवळपासची सर्वच गर्दी ओसरली होती. आइस्क्रिम वगैरे विकणारेही आपापलं सामान आवरून निघून गेले होते. ताज हॉटेलसमोर होती थोडी वर्दळ…मेन गेटशी दरवाजात उभे होते.

आता रस्त्यावर भडक वेषभूषेतल्या बऱ्याच महिला दिसत होत्या. तंग कपडे, विचित्र हावभाव…तसल्याच असाव्यात त्या स्त्रिया.

थोड्या थोड्या वेळात गाडीतून लोक यायचे. कुणा एकी जवळ थांबायचे. भाव ठरला पटला तर ती स्त्री त्या गाडीत बसायची अन् निघून जायची. तो सगळा प्रकार बघून रोहिणीला गंमत वाटली.

तेवढ्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्यात तीन चार तरूण होते. कारच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून एकानं म्हटलं, ‘‘हाय ब्युटीफुल? एकटीच बसली आहेस? ये, आमच्या बरोबर…मजा करू, हिंडू फिरू?’’

रोहिणी दचकली…हे कॉलेज तरूण तिला वेश्या समजाहेत की काय?

हरामखोर…त्यांना एक सभ्य, कुलीन स्त्री अन् वेश्या यातील फरक कळू नये? शी, इथं थांबण्यात अर्थ नाही, घरी जायला हवं.

ती घाईनं चालू लागली. कार तिच्याजवळून फुरर्कन निघून गेली…अन् काही क्षणांतच माघारी वळून पुन्हा तिच्याजवळ आली.

‘‘ये ना डार्लिंग, तुला हॉटेलात नेतो, बीयर पिऊयात, नॉनव्हेज खाऊयात…तुला चायनीज आवडतं? चल, महागड्या हॉटेलात तुला जेवायला घालतो. आपण डान्स करू…ये ना,’’ पुन्हा एका तरूणानं खिडकीतून डोकं बाहेर काढत तिला म्हटलं.

तिनं संताप गिळून शांतपणे म्हटलं, ‘‘तुमचा गैरसमज झालाय, मी एक गृहिणी आहे. स्वत:च्या घरी निघालेय.’’

‘‘असं? तर मग तुला घरी सोडतो…कुठं राहतेस तू?’’

ती मुलं तिच्या चालण्याच्या स्पीडनंच कार चालवत होती. सतत तिच्याशी बोलत होती. रोहिणीच्या लक्षात आलं, या मुलांकडे पैसे नाहीएत…गाडीही बहुधा चोरलेली असावी. त्यांना फुकटात मिळेल तेवढी चंगळ करायची आहे.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रोहिणी चालत होती. तेवढ्यात त्यांनी गाडी तिच्यापुढे आडवी घातली. एक जण खाली उतरला अन् त्यानं तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. ‘‘इतका हट्टीपणा कशासाठी करतेस स्वीटी? चल, आमच्याबरोबर…तुला सुपर टाइम देतो. आय प्रॉमिस…’’

‘‘खबरदार हात लावाल तर…मी पोलिसांना बोलवेन. आरडा ओरडा करेन…’’ रोहिणी कडाडली.

तेवढ्यात आणखी एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीत कार्तिक होता.

‘‘रोहिणी, पटकन् ये. गाडीत बैस.’’ त्यानं जोरात हाक मारली. त्या मुलांना झटकून रोहिणी गाडीत बसली. कार्तिकला बघून मुलं पटकन् कारमध्ये बसून निघून गेली.

‘‘इतक्या रात्री हे काय भलतंच सुचलं तुला?’’ कार्तिकनं झापलंच तिला. ही काय बाईनं एकटं दुकटं फिरायची वेळ आहे? कधी गं तुला समजून येणार? कसले गुंड मवाली फिरत असतात. शिकार शोधत असतात…त्यांच्या तावडीत सापडली असती तर?’’

‘‘काय झालं असतं?’’

‘‘ती पोरं तुला गाडीत घालून घेऊन गेली असती…’’

‘‘अशी बरी घेऊन गेली असती? पोलीस असतात ना?’’

‘‘आत्ता इथं जवळपास होता एक तरी पोलीस?’’

रोहिणी गप्प होती.

‘‘तुला त्यांनी गाडीत घालून नेली असती…रेप करून कुठं तरी फेकून मोकळे झाले असते…अगं कळंत नाही तुला? अक्कल शेण खायला गेली का?’’ कार्तिक संतापून म्हणाला.

‘‘असं नसतं झालं. मी मोठ्यांदा ओरडले असते. लोक आले असते…’’

‘‘बोलायच्या गोष्टी आहेत सगळ्या. पाच मिनिटात सगळं घडलं असतं…कुणाला काही समजलंही नसतं…तू एकटी होतीस…ती चौघं तरूण मुलं होती. विचार कर…खरं तर बायकांनी स्वत:च विचार करायला हवा. अनोळखी माणसापाशी लिफ्ट मागणं, निर्जन रस्त्यावर एकटं फिरणं किती धोक्याचं आहे.’’

रोहिणी आता गप्प बसून होती. दोघं घरी पोहोचली…घरात पोहोचताच कार्तिकनं तिला मिठीत घेतली, ‘‘एक वचन दे…कधीही आपलं भांडण झालं तरी तू एकटी अशी घराबाहेर पडणार नाहीस म्हणून.’’ त्यानं खिशामधून इटलीच्या प्रवासाची विमान तिकिटं अन् तिथल्या हॉटेल बुकिंगची कागद पत्रं काढून तिच्या हातात ठेवली.

‘‘हे काय? तुम्ही तर म्हणाला होता की यंदा जमणार नाही म्हणून?’’ रोहिणीनं आश्चर्यानं विचारलं.

‘‘म्हटलं होतं, पण माझ्या लाडक्या बायकोचं म्हणणं मी टाळू शकत नाही ना?’’

‘‘नको, तिकिटं कॅन्सल करा.’’

‘‘का?’’

‘‘अहो, शंकुतला अक्कांकडे लेकीचं लग्न आहे. आपल्याला जावं लागेल ना?’’

‘‘अक्काला सांगेन काही तरी कारण…नाही जमत यायला.’’

‘‘घ्या! म्हणजे पुन्हा सगळ्यांकडून ऐकून घ्यायचं की रोहिणी सासरच्यांशी फटकून वागते अन् नवऱ्यालाही मुठीत ठेवलंय…त्यालाही आमच्यात मिसळू देत नाही.’’

आश्चर्यानं तिच्याकडे बघत कार्तिकनं म्हटलं, ‘‘कमाल करतेस गं! चित पण तुझा, पट पण तुझा? अगं छापा, काटा एक काही तरी ठरव ना? कसं काय करावं मी?’’

‘‘असंच आहे माझं!’’ त्याला मिठी मारत अतीव समाधानानं अन् गर्वानं रोहिणीनं म्हटलं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...