कथा * आशा शहाणे

वसुधा अजूनही दाराकडे बघत होती. नुकतीच त्या दारातून रावी आपल्या पतीसोबत बाहेर पडली होती. अंगावर प्रसन्न पिवळ्या रंगाची साडी, मॅचिंग ब्लाउज, हातात बांगड्या, कपाळावर छानशी टिकली, केसांचा सुरेखसा अंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कानांत कर्ण फुलं अगदी सोज्वळ सात्त्विक भारतीय सौंदर्याची मूर्ती दिसत होती. हातातल्या तान्हुल्यानं तिच्या मातृत्त्वाचं तेज अधिकच वाढवलं होतं.

वसुधाच्या नजरेपुढे काही वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमातल्यासारखा दिसू लागला. रावीचे आईबाबा तिला समुदेशनासाठी वसुधाकडे घेऊन आले होते.

वसुधा हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याच्याच जोडीनं ती पेशंटना समुपदेशही देते. या दोन्ही कामांमुळे तिच्याकडे वेळ कमी असतो. पण सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम ती अत्यंत निष्ठेनं करते. मानसिक दृष्टीनं खचलेल्या, निराशेनं ग्रासलेल्या पेशंटना त्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद देणं, त्यांचं आयुष्य मार्गी लावणं हेच तिच्या आयुष्याचं उद्दीष्ट होतं.

रावीला वसुधाच्याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. तिनं पंख्याला ओढणी बांधून गळफास घ्यायचा प्रयत्न केला होता. वेळेवर आईनं बघितलं, आरडाओरडा केला. रावीला गळफासातून सोडवून हॉस्पिटलमध्ये आणलं. योग्य वेळेत योग्य ते उपचार मिळाले आणि रावी वाचली. डॉ. वसुधाला त्या क्षणीच लक्षात आलं, तिच्या शरीरापेक्षाही तिचं मन घायाळ झालेलं आहे. गरज मनावरच्या उपचारांची आहे.

वसुधानं खरं काय ते जाणून घेण्यासाठी रावीच्या आईशी, शांताशी संवाद साधला. आधी तर ती काही बोलायलाच तयार नव्हती. पण वसुधानं हळूहळू तिला विश्वासात घेतलं. रावीच्या उपचारांसाठी सगळी माहिती गरजेची आहे. ही सगळी माहिती अगदी गुप्त ठेवली जाते. असं सगळं पटवून दिलं, तेव्हा त्यांनी कसंबसं एकदाचं काय ते सांगितलं. ते ऐकून वसुधेच्या मनात निरागस रावीबद्दल ममता दाटून आली.

शांतानं सांगितलं, ‘‘रावीवर बलात्कार झाला आहे आणि तो ही तिच्या वडिलांच्या खास मित्राकडून. वडिलांचे मित्रच असल्यामुळे त्या घरी ती केव्हाही जात होती. त्यांची मुलगी रावीची मैत्रिणच होती. दोघी एकाच वर्गात होत्या. एक दिवस रावी एक प्रोजक्ट फाईल घ्यायला त्यांच्या घरी गेली. तेव्हा मैत्रीण व तिची आई बाहेर गेलेल्या होत्या. ‘तिची बॅग आत आहे, तू हवं तर त्यातून फाईल काढून घे’ तिचे बाबा म्हणाले. त्यानंतर रावी घरी आली. ती सरळ खोलीत जाऊन झोपली. रात्री तिला तापच भरला. असेल वायरल म्हणून आम्ही डॉक्टरांचं औषध दिलं. तार उतरल्यानंतरही रावी कॉलेजला जात नव्हती. आम्हाला वाटलं, अॅन्युअल गॅदरिंग, स्पोर्ट्स वगैरे चालू असेल म्हणून क्लासेस लागत नसतील. म्हणजे फारसं गंभीरपणे आम्ही ते घेतलंच नाही.

मग एक दिवस यांचे मित्र घरी आले. हॉलमध्ये वाचत बसलेली रावी घाबरून तिथून उठली आणि खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. एरवी काकांसाठी पाण्याचा ग्लास घेऊन ती स्वत:च जायची. मला ते खूप खटकलं. मग मी हळूवारपणे रावीला विश्वासात घेतलं. तिनं रडत रडत त्या किळसवाण्या घटनेबद्दल सांगितलं. तेव्हा माझा संताप संताप झाला. असं वाटलं, ताबडतोब पोलिसात तक्रार द्यावी. पण रावीचे बाबा म्हणाले, ‘‘संयम ठेवायला हवा, पोलिसांत तक्रार दिली तरी पुढले सोपस्कार अवघड असतात. कोर्टात केस गेली तर अजूनच अब्रूचे वाभाडे निघतील. कोर्ट पुरावा मागतं. आपला पुरावा कुठून देणार? वकील अत्यंच वाईट भाषेत प्रश्न विचारतात. आपली भाबडी पोर तिथं कशी टिकून राहील? तिला पुन्हा त्या सगळ्या घटनाक्रमातून गेल्यासारखं वाटेल. आता ही गोष्ट फक्त आपल्यातच आहे, उद्या सर्वतोमुखी झाली तर पोर पार कोलमडेल. सगळं आयुष्य काढायचंय तिला…कुणी तिच्याकडे निर्दोष म्हणून बघणार नाही…आपण शांत रहायचं, रावीचं आयुष्य मार्गी लावायचं…तिला या धक्क्यातून सावरायला मदत करायची.’’

शांतानं हे सगळं सांगितलं तेव्हा संतापानं, भावना अनावर झाल्यानं ती थरथरत होती. एक दीर्घ श्वास घेऊन तिनं म्हटलं, ‘‘लेकीची अवस्था बघून आतडं तुटायचं. वाटायचं त्या नराधमाला भर बाजारात फोडून काढावं. पण पुन्हा विचार यायचा तिचा आज तर उध्वस्त झालाच आहे, निदान उद्या तरी नीट सावरायला हवा. आम्ही तिला खूप समजावलं. ती कॉलेजात जाऊ लागली. भाऊ सतत तिच्यासोबत असायचे. मीही सतत तिच्याभोवती असायची. तिचं हसणंबोलणं बंद झालं होतं. पण असं वाटलं होतं ती हळूहळू सावरते आहे, आज मी थोडा वेळ शेजारी गेले होते तेवढ्यात तिनं हा आत्मघातकी प्रयत्न केला.’’ शांताला रडू अनावर झालं.

वसुधानं सर्व काही शांतपणे अन् मनापासून ऐकून घेतलं. तिनं शांताला सांगितलं, ‘‘रावीला माझ्या घरी घेऊन या. तिला समुपदशनाची गरज आहे. ती नक्की यातून बरी होईल. तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याबद्दल तुम्ही निश्चत असा..’’

पहिल्या भेटीत वसुधाशी रावी एक चकार शब्दही बोलली नाही. वसुधा बोलत होती अन् रावी खाली मान घालून नुसती बसून होती. दुसऱ्या मिटिंगमध्येही तसंच घडलं. तिसऱ्या भेटीत रावीनं फक्त नजर उचलून वसुधाकडे बघितलं. याप्रमाणे अजून एक दोन मिटिंग्ज झाल्या. वसुधा तिला परोपरीनं समजावत होती अन् रावी निर्विकार मुद्रेनं फक्त भिंतीकडे बघत बसायची.

एका मिटिंगमध्ये मात्र रावी कठोरपणे म्हणाली, ‘‘सगळं काही विसरून जगणं सुरू करा हे सांगणं खूप सोपं आहे. पण जे माझ्या बाबतीत घडलंय ते वाळूवर लिहिलेल्या अक्षरासारखं नाही. एक लाट आली अन् सगळं धुवून घेऊन गेली…मी काय भोगलयं हे तुम्ही समजू शकणार नाही अन् हे करणारा कुणी आपलाच असतो तेव्हा मनाला होणाऱ्या यातना कुणाला कशा कळणार?’’ बोलता बोलता ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली.

वसुधानं तिला जवळ घेतलं. काही वेळ ती रावीला थोपटत होती. रावीच्या मनातली खळबळ अश्रूंच्या रूपानं वाळळून जात होती. काही वेळानं वसुधानं तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेतला अन् ती कोमल शब्दात म्हणाली, ‘‘या यातना माझ्याखेरीज कोण जाणून घेईल…माझ्या पोरी, शांत हो…’’

रावीनं दचकून तिच्याकडे बघितलं…वसुधाच्या चेहऱ्यावरची वेदना अन् डोळ्यातले अश्रू बघून ती आपले हुंदके विसरली. वसुधानं तिला स्वत:च्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगितला…वीस वर्षांपूर्वीचा.

‘‘शाळेचं ते शेवटचं वर्ष होते. शाळेनं जंगी फेयरवेल पार्टी दिली होती. भाषणं, मनोरंजनाचे कार्यक्रम, जेवण वगैरे आटोपेपर्यंत बराच अंधार पडला होता. मी अन् माझी मत्रिण रागिणी शाळेपासून थोडया अंतरावर उभ्या होतो. तिथं रिक्षा नेहमीच मिळायच्या. पण त्यादिवशी एकही रिक्षा नव्हती. आम्ही थोड्या घाबरलो होतो. काळजीत होतो. कारण रस्त्यावर दिवेही नव्हते. तेवढ्यात एक कार आमच्यापाशी येऊन थांबली. काही कळायच्या आत दोन धटिंगणांनी मला कारमध्ये ओढून घेतलं. अंधाराचा फायदा घेऊन रागिणी कशीबशी निसटली. तिनं माझ्या घरी जाऊन ही बातमी दिली. पोलिसांच्या मदतीनं घरचे लोक माझ्यापर्यंत पोचेतो त्या गुंडांनी माझ्या अब्रूची लक्तरं करून मला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकलं होतं. कोण, कुठले काही कळायला मार्ग नव्हता.’’

मला घरी आणलं, तेव्हा मी अर्धमेल्या अवस्थेत होते. आईबाबा सुन्न झाले होते. डॉक्टरांनी मला औषध दिलं. सलाइन लावलं…शुद्धीवर आले अन् त्या प्रसंगाच्या आठवणीनं धाय मोकलून रडायला लागले. आई बाबा समजूत घालत होते. धीर देत होते. पण मला काहीच समजत नव्हतं. तो ओंगळ स्पर्श दूर व्हावा म्हणून घासून घासून अंघोळ करायचे. तरीही वाटायचं अनेक झारळं अंगावरून फिरताहेत…कशीबशी परीक्षेला बसले. मुळात हुशार होते. अभ्यास छानच झालेला होता म्हणून पेपर लिहिता आले…

तेवढ्यात माझ्या लक्षात आलं माझी मासिकपाळी चुकली आहे. आता जगण्यात काय अर्थ होता. मी जीव द्यायचा प्रयत्न केला पण आईनं मला वाचवलं. तिनं अन् बांबानी पुन्हा पुन्हा मला समजावलं. मी स्वत:ला हकनाक अपराधी मानते आहे. विनाकारण त्रास करून घेते आहे. अपराधी तर ते गुंड आहेत. लाज त्यांना वाटायला हवी.

आईनं ओळखीच्या लेडी डॉक्टरला सगळं सांगितलं. तिनं मला त्या संकटातून मोकळं केलं. तिनंही तेच सांगितलं, ‘‘मी स्वच्छ आहे. पवित्र आहे. ताठ मानेनं मी जगायचं आहे. त्याक्षणी मी ठरवलं…यापुढे आयुष्य माझ्यासारख्या मुलींसाठी वेचीन. निष्पाप, निरपराध मुलींना स्वाभिमानानं जगायला शिकवेल. तू जर पुन्हा ठामपणे उभी राहिलीस, तर मला आनंद होईल…’’ वसुधानं आपली कहाणी संपवली अन् एक दीर्घ श्वास घेतला.

‘‘पण…पण तुम्हाला समाजाची भीती नाही वाटली?’’ रावीनं विचारलं.

‘‘कुणाची भीती? कुठला समाज? आता मला कुणाचीच भीती वाटत नव्हती. जे घडायचं ते घडून गेलं होतं. आता फक्त मला मिळवायचं होतं.’’

‘‘मग काय झालं? म्हणजे…तुम्ही आजच्या या मुक्कामावर कशा पोहोचलात?’’ अजूनही रावीचा विश्वास बसत नव्हता वसुधाच्या बोलण्यावर.

‘‘तो प्रसंग आयुष्यातून पुसून टाकण्यासाठी मी ते शहर सोडलं. पुढचं सगळं शिक्षण मी विद्यापीठाच्या वसतीगृहात राहून पूर्ण केलं. तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एकच ध्येय होतं मानस शास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवायची. माणसाच्या मनांत अगदी आतवर जाऊन शोध घ्यायचा. मनाच्या तळाशी जिथं माणूस आपले विकार, निराशा, विचार अन् अनेक रहस्य लपवून ठेवतो, तिथपर्यंत पोहोचायचं. माझ्या वीकनेसलाच मी माझी शक्ती बनवली. ती लढाई माझी एकटीची होती अन् मी जिंकले.’’

काही वेळ कुणीच बोललं नाही. मग रावीच्या खांद्यावर हात ठेवून वसुधा म्हणाली, ‘‘हे बघ रावी, आपलं आयुष्य फार फार मौल्यवान आहे. ते भरभरून जगण्यासाठी मिळालं आहे. दुसऱ्या कुणाच्या पापाची शिक्षा स्वत:ला का म्हणून द्यायची? तुलाही आता तुझी लढाई एकट्यानंच लढायची आहे. धीर खचू द्यायचा नाही, निराश व्हायचं नाही. तुझं वयच असं कितीसं आहे गं? तू आपलं शिक्षण पूर्ण कर. छानसा जोडिदार शोधून लग्न कर. मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस.’’

रावीनं लगेच प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही लग्न का नाही केलंत?’’

एक नि:श्वास सोडत वसुधानं म्हटलं, ‘‘त्यावेळी मी एक चूक केली…माझ्याबरोबर शिकणाऱ्या डॉ. नमननं मला मागणी घातली होती. मलाही तो आवडत होता. पण आयुष्याच्या जोडीदारापासून आपला भूतकाळ लपवून ठेवण्यापेक्षा त्याला सगळं स्वच्छ सांगावं असा विचार करून मी माझ्या आयुष्यातली ती घटना त्याला सांगितली. त्यानंतर त्यानं लग्नाला नकार दिला नाही पण त्याची वागणूक बदलली. त्याच्या प्रेमात आता दयेची, उपकाराची झाक होती. ती मला सहन होईना. या मुक्कामावर पोहोचल्यानंतर मला कुणाचीची दया नको होती. मीच मग पाऊल मागे घेतलं. कारण पुढल्या आयुष्यात मला नमनच्या पुरूषी अंहकाराचा नक्कीच त्रास झाला असता. ते मला नको होतं.’’

‘‘मग तुम्ही मला लग्न करायला का सांगताय? ही परिस्थिती माझ्याही बाबतीत उद्भवू शकते ना?’’

‘‘तेच मी तुला सांगते आहे. जी चूक मी केली ती तू करू नकोस. स्वत:ला अनेक गर्लफ्रेंडस् असणाऱ्या पुरूषाला पत्नीचा बायफ्रेंड चालत नाही. बायको व्हर्जिनच हवी असते. हे कटूसत्य आहे. तुला कुणालाही काहीही सांगायची गरज नाहीए. तू सांगितलं नाहीस तर कुणालाही यातलं काहीही कळणार नाहीए…’’

‘‘पण…मग ही फसवणूक नाही का ठरणार?’’ रावी अजूनही गोंधळलेलीच होती.

‘‘फसवणूक तुझ्या बाबांची झालीय…त्यांच्या मित्रानं केलीय. फसवणूक त्या मित्राच्या कुटुंबीयांची झालीय. फसवणूक माणुसकीची अन् एका निरागस आयुष्याची झालीय. तू या एका गोष्टीचं काय घेऊन बसली आहेस? आता मुलींनी, स्त्रियांनी थोडं चतुर आणि स्वार्थी व्हायला हवंय. आयुष्याच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यात आता एक आणखी म्हणजे आठवा रंग जोडावा लागणार आहे. झगमगत्या आत्मविश्वासाचा, झळाळत्या मन:शक्तीचा, थोड्याशा बेदरकारपणाचा.’’ रावीच्या डोळ्यात रोखून बघत वसुधा अगदी शांत पण ठाम स्वरात बोलत होती.

ते शब्द रावीच्या मनांत खोलपर्यंत झिरपत होते. वसुधा पुन्हा म्हणाली, ‘‘असं बघ, तुझे ते तथाकथित अंकल तर आजही समाजात उजळ माथ्यानं वावरताहेत. खरं ना? मग तू का खाली मान घालून भीत भीत जगायचं? अगं शुद्ध सोन्यावर चिखल उडाला तरी सोनं ते सोनंच असतं. तू स्वत: शंभर नंबरी सोनं आहेस. फक्त त्यावरचा त्या घटनेचा डाग आत्मविश्वासाच्या फडक्यानं पुसून टाक. समाजात वावरताना बेदरकारपणे वावर.’’

रावी विचार करत होती. मग तिनं म्हटलं, ‘‘पण जर त्यांनी मला कधी ब्लॅकमेल केलं तर?’’

‘‘तसं होणार नाही. माझ्या ओळखीच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याला चांगलाच दमात घेतलाय. यापुढे तो या गावातही दिसणार नाही. स्वत:च्या बायको अन् मुलांसमोर आपलं पाप उघड व्हावं हे कुणाही पुरूषाला सहन होणार नाही. त्या बाबतीत तू नि:शंक राहा.’’

त्यानंतर एकदोन मिटिंग्ज अजून झाल्या. रावी आता पूर्ण आत्मविश्वासानं आयुष्याला सामोरी जाणार होती. तिनं शिक्षण पूर्ण केलं. चांगली नोकरीही मिळाली. चांगलं स्थळ सांगून आलं. लग्नही झालं.

मधल्या काळात वसुधा रावीला भेटली नाही. पण ती शांताच्या सतत संपर्कात होती. वेळोवेळी मार्गदर्शन करत होती. रावीची प्रगती ऐकून तिला समाधान वाटत होतं. लग्न होऊन रावी सासरच्या गावी निघून गेली होती. ती आज आपल्या तान्हुल्याला घेऊन त्याच्या बारशाचं आमंत्रण द्यायला वसुधाकडे आली होती.

एक कळी कोमेजता कोमेजता पुन्हा उमलली होती. वसुधाला अगदी कृतकृत्य वाटत होतं. ती समाधानानं उठली. रावीच्या बाळासाठी अन् रावीसाठी काहीतरी आहेर करायचा होता. पर्स घेऊन घराबाहेर पडताना प्रसन्न हास्य तिच्या मुखावर होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...