कथा * राजलक्ष्मी तारे

रात्रभर नंदना बेचैन होती. झोप लागत नव्हती. असं का होतं ते तिला समजत नव्हतं. सगळं अंग मोडून आल्यासारखं वाटत होतं.

सकाळी उठली अन् तिला घेरीच आली. कशीबशी पलंगावर बसली. डोकं गरगरत होतं. ती तशीच बसून राहिली. तेवढ्यात तनुजा वहिनीचा आवाज ऐकू आला.

‘‘नंदू, उठतेस ना? ऑफिसला जायला उशीर होईल…’’

‘‘उठलेय वहिनी, आवरून येतेय.’’ नंदनानं तिथूनच म्हटलं.

पण नंदनाच्या थकलेल्या आवाजावरून तनुजाला थोडी शंका आली. ती हातातलं काम तसंच टाकून नंदनाच्या खोलीत आली. ‘‘काय झालं गं? बरं नाहीए का?’’

‘‘हो गं!’’ नंदनानं म्हटलं.

तिच्या अंगाला हात लावून तनुजानं म्हटलं, ‘‘ताप नाहीए, पण डोकं दुखतंय का? नेमकं काय होतंय?’’

तेवढ्यात नंदना उठून बाथरूममध्ये धावली. तिला ओकारी झाली. तनुजानं तिच्या पाठीवरून हात फिरवला. चुळा भरून झाल्यावर नंदनाला हाताला धरून तिनं बेडवर बसवलं.

तनुजाला काळजी वाटली, ‘‘नंदुला काय झालं?’’ नंदनाचा भाऊ म्हणजे तनुजाचा नवरा सध्या परगावी गेलेला होता. तिनं नंदनाला दिलासा देत म्हटलं, ‘‘नंदू, आज ऑफिसला जाऊ नकोस, घरीच विश्रांती घे. मी तुझ्यासाठी चहा आणते. तू फक्त ऑफिसात फोन करून कळव.’’

नंदनानं केवळ मान हलवली.

तनुजा तिच्यासाठी चहा घेऊन आली, तेव्हा नंदना अश्रू गाळत होती. ‘‘काय झालं गं?’’ तिचे डोळे पुसत तनुजानं विचारलं.

‘‘वहिनी, किती काळजी घेतेस गं माझी. तुझ्यामुळे मला आई नाही ही जाणीवच कधी झाली नाही. कायम माझ्यावर माया करतेस, माझ्या चुका पोटात घालतेस, माझी इतकी काळजी घेतेस…पण तरीही आज मला बरंच वाटत नाहीए.’’

‘‘काळजी करू नको, चहा घे. आवर…आपण दोघी ब्रेकफास्ट घेऊन डॉक्टरकडे जाऊन येऊ. बरं वाटेल तुला,’’ तनुजानं तिच्या खांद्यावर थोपटत दिलासा दिला.

थोड्या वेळानं दोघी घराबाहेर पडल्या. डॉ. माधवी तनुजाची मैत्रिण होती. निघण्यापूर्वीच तनुजानं तिला फोन केला होता.

माधवीनं नंदनाला जुजबी प्रश्न विचारले, तपासलं अन् नंदनाला बाहेर पाठवून तनुजाला केबिनमध्ये बोलावलं, ‘‘तनुजा, नंदना विवाहित आहे का?’’ तिनं विचारलं.

‘‘नाही माधवी, तिचं लग्न बरंच लांबलंय. आता एका स्थळाकडून होकार येण्याची आशा आहे. का गं? तू हे का विचारते आहेस?’’

‘‘तनुजा, प्रसंग गंभीर आहे. नंदनाला दिवस गेलेत.’’

‘‘बाप रे!’’ तनुजाच्या पायाखालची जमीन सरकली. असं कसं घडलं? नंदनाचं पाऊल घसरलं कसं? मला तिनं कसं सांगितलं नाही?

तात्पुरतं बरं वाटावं म्हणून डॉ. माधवीने लिहून दिलेल्या गोळ्या घेऊन दोघी घरी आल्या. नंदनाला कसं विचारावं तेच तनुजाला कळत नव्हतं. तिनं पटकन् स्वयंपाक केला. नंदनाला जेवू घातलं. गोळ्या दिल्या अन् नंदनाला झोपायला लावलं.

सायंकाळपर्यंत नंदनाला थोडं बरं वाटेल. मग तिला शांतपणे सर्व विचारू असं तनुजानं ठरवलं.

पाच वाजता तनुजानं चहा केला अन् ती नंदनाच्या खोलीत गेली. नंदना रडत होती. ‘‘नंदू, चहा घे. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे.’’ तनुजा म्हणाली.

डोळे पुसून चहाचा कप घेत नंदनानं म्हटलं, ‘‘हो वहिनी, मलाही तुला काही सांगायचं आहे.’’

दोघी चहा घेऊन एकमेकींकडे बघत बसल्या. सुरूवात कुणी करावी हेच कळत नव्हतं.

शेवटी तनुजानं धीर एकटवून विचारलं, ‘‘नंदू, तू प्रेग्नंट आहेस हे तुला माहीत आहे का?’’

नंदूनं दचकून तिच्याकडे बघितलं, ‘‘नाही वहिनी, पण मला बरं वाटत नाहीए,’’ ती म्हणाली.

तनुजाला काय बोलावं तेच कळेना, ‘‘नंदना, अगं, तू तिशीला येतेस अन् तुला दिवस गेलेत हे ही कळलं नाही? अगं, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस कशी? आता तुझ्या दादाला अन् तुझ्या बाबांना मी काय तोंड दाखवू? काय उत्तर देऊ? त्यांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे गं!…’’

रडत रडत नंदना म्हणाली, ‘‘वहिनी, अगं माझी मासिक पाळी खूप अनियमित आहे. चार चार महिने मला पाळीच येत नाही. मागे तू मला डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यायला लावले, तेव्हा बरी नियमित झाली होती. मग मी कंटाळून औषधं बंद केल्यावर पुन्हा तसंच सुरू झालं.’’

‘‘बरं, मला सांग, तुझे कुणावर प्रेम आहे का? तुला मर्यादा ओलांडण्याचा मोह कोणामुळे झाला? कुणी पुरूष आवडला आहे तर मला का सांगितलं नाहीस? अजूनही सांग, तुझं त्याच्याशी लग्न करून देऊया.’’

‘‘वहिनी…दादाचे बॉस वीरेंद्र…ते आणि मी…’’

‘‘सत्यानाश! बापरे. अगं वीरेंद्रचं तर लग्न झालंय, दोन मुलंही आहेत त्याला…तो तुझ्याशी लग्न करणार आहे का?’’

‘‘मला नाही माहीत…’’ नंदना घाबरून म्हणाली, ‘‘दादानं त्यांच्याशी माझ्या एका पार्टीत ओळख करून दिली. तेव्हापासून ते माझ्या मागे आहेत. त्यांचं लग्न झालंय हेही मला आत्ता तुझ्याकडूनच कळतंय…’’

नंदनाचं बोलणं ऐकून तनुजाला काय करावं तेच समजेना. तिला नंदनाचा राग आला अन् मग कीवही आली. वीरेंद्रला तर फटके मारावेत इतका त्याचा राग आला. ‘‘नंदना, अगं चार दिवसांत तुझे दादा अन् बाबा येतील घरी…त्यांना काय सांगायचं आपण…?’’

‘‘वहिनी, काहीही कर, पण मला वाचव. दादा तर जीवच घेईल माझा…’’ भीतिनं पांढरी फटक पडली होती नंदना.

‘‘शांत हो, आपण काही तरी मार्ग काढूया.’’ तनुजानं तिला मिठीत घेऊन दिलासा दिला.

रात्रभर दोघींना झोप नव्हती. खूप विचार केल्यावर तनुजानं ठरवलं की रजतला म्हणजे नवऱ्याला विश्वासात घेऊन सर्व सांगायचं. तो संतापेल, त्रागा करेल, पण काहीतरी मार्ग काढेलच.

सकाळीच तनुजानं रजतला फोन करून सर्व सांगितलं.

तनुजाचं बोलणं ऐकून रजत अवाक् झाला. काही क्षण तसेच गेले. मग म्हणाला, ‘‘मी दुपारच्या फ्लाइटनंच निघतोय तोपर्यंत तू माधवीशी बोलून अॅबॉर्शन करता येईल का विचार. बाकी सर्व मी आल्यावर बघूयात. पण तो वारेंद्र इतका हलकट असेल असं मला वाटलं नव्हतं. माझाच विश्वासघात केला हरामखोरानं,’’ रजतनं फोन ठेवला.

तनुजानं नंदनाला चहा आणि ब्रेकफास्ट दिला. स्वत:ही घेतला अन् आवरून दोघी डॉक्टरकडे निघाल्या. नंदना सतत रडत होती. तिला जवळ घेत तनुजानं म्हटलं, ‘‘अशी सारखी रडू नकोस. थोडी धीट हो.’’

तनुजानं माधवीला अॅबार्शन करायचं आहे असं सांगितलं. माधवीनं नंदनाला काळजीपूर्वक तपासलं. तिचा चेहरा गंभीर झाला.

नंदनाला तपासल्यावर माधवीनं तनुजाला बोलावून घेतलं, ‘‘आय एम सॉरी तनु, पण आपल्याला अॅबॉर्शन करता येणार नाही. अंग साडे चार महिने झाले आहेत. नंदनाच्या जिवाला त्यात धोका आहे.’’

नंदना हताश झाली. हवालदिल झाली. काही दिवसांत ही गोष्ट जगजाहीर होईल. नंदनाचं कसं होणार? आता हिच्याशी लग्न कोण करणार? भोळी भाबडी पोर…कशी त्या वीरेंद्रला भुलली अन् मर्यादा ओलांडून या परिस्थितीत अडकली. नंदनाची एक चूक तिला केवढी महागात पडणार होती. तनुजाचेही डोळे आता भरून आले होते.

ती माधवीच्या व्हिजिटर्स लाउंजमध्ये दोन्ही हातात डोकं धरून बसली होती. तेवढ्यात रजत तिथं पोहोचला. ‘‘कशी आहेस तनू? माधवी काय म्हणाली? सगळं ठीक आहे ना?’’

त्याला बघताच तनुजाचा बांध फुटला. त्याला मिठी मारून ती रडू लागली.

‘‘काहीही ठिक नाहीए रजत, माधवीनं सांगितलं की अॅबॉर्शन करता येणार नाही. त्यात नंदनाचा जीव जाऊ शकतो. भाबडी पोर, केवढी मोठी चूक करून बसलीय…’’

रजत संतापून म्हणाला, ‘‘जाऊ दे जीव, तसंही आता आपण लोकांना काय तोंड दाखवणार आहोत?’’

‘‘असं नको म्हणूस रजत…अरे, आपल्या मुलीसारखी आहे ती…चुकली ती, पण आपण तिला सावरायला हवं ना? तू धीर सोडू नकोस…मार्ग काढूया आपण…’’

तिघंही घरी परतली. संतापलेल्या रजतनं नंदूकडे बघितलंही नाही. बोलणं तर दूरच. त्याला स्वत:चाही राग येत होता. त्यानंच तर वीरेंद्रशी नंदूची ओळख करून दिली होती. ‘हिच्यासाठी मुलगा बघ’ असंही सांगितलं होतं. पण तो तर हलकटच निघाला.’’

घरी पोहोचातच नंदूनं दादाचे पाय धरले अन् ती धाय मोकलून रडू लागली. ‘‘दादा, मला मार, माझा जीव घे, पण बोल माझ्याशी…’’

रजतचेही डोळे पाणावले. तिला आवेगानं मिठीत घेतली. तिला थोपटलं…शांत केलं अन् तो खोलीत निघून गेला.

तनुजानं पकटन् स्वयंपाक केला, पण जेवण कुणालाच गेलं नाही. तनुजानं रजतला म्हटलं, ‘‘चार सहा दिवसातच बाबाही येतील…त्यांना काय सांगायचं? नंदनाचं हे असं ऐकून तर त्यांना हार्ट अटॅकच येईल.’’

विचार करून रजतनं म्हटलं, ‘‘मी बाबांना फोन करून सांगतो की अजून काही दिवस तुम्ही काकांकडेच राहा. घरात थोडं रिपेअरिंगचं काम काढलंय. तोवर विचार करायला वेळ मिळेल.’’

दुसऱ्या दिवशी तनुजा रजतला म्हणाली, ‘‘मी काही दिवस नंदनाला घेऊन सिमल्याला जाते.’’

‘‘तिथं काय करशील? तुझा भाऊ तिथं एकटाच असतो ना?’’

‘‘हो. त्यानं लग्न केलं नाही…एकदम माझ्या मनात आलं, त्याला विचारावं, नंदनाशी लग्न करशील का?’’

‘‘अगं, पण…नंदनाच्या अशा अवस्थेत…तो होकार देईल?… पण एक सांग, आता तो ३७-३८ वर्षांचा असेल, त्यानं लग्न का केलं नाही?’’

‘‘ही एक टॅ्रजेडीच होती. ज्या मुलीवर त्याचं प्रेम होतं, तिनं त्याला लग्नाचं वचनही दिलं होतं अन् लग्न त्याच्या मित्राशी केलं. त्यामुळे तो खूप दुखावला गेला. त्यानंतर त्यानं बरीच वर्षं लग्नाचा विचार केला नाही. आम्ही मुली दाखवल्या पण तो नाकारत होता. मला आता एकदम आठवलं, मागे एकदा तो आपल्याकडे आला असताना त्यानं नंदूला बघितली होती. ती त्याला आवडली असल्याचंही तो बोलला होता. पण तेव्हा सासूबाई खूप आजारी होत्या. त्यानंतर त्या गेल्या. बाबांना धक्क्यातून सावरायचं, नंदूला सांभाळायचं या सगळ्या गडबडीत मी ते विसरले. आपण नंदूसाठी नंतर स्थळ बघायला लागलो, तेव्हाही माझ्या डोक्यात माझ्या भावाचं स्थळ आलं नाही…आता बघते विचारून…’’

दुसऱ्याच दिवशी नंदूला घेऊन तनुजा भावाकडे सिमल्याला गेली. तिनं प्रवासात नंदूला स्वत:च्या भावाबद्दल सांगितलं अन् तो तयार असेल तर तुझेही मत मला सांग असंही समजावलं.

अचानक आलेल्या बहिणीला बघून विमलेश आनंदला. त्यानं प्रेमानं, अगत्यानं दोघीचं स्वागत केलं तनुजानं आपल्या येण्याचा हेतू त्याला सांगितला. नंदनाची परिस्थितीही सांगितली.

विमलेश म्हणाला, ‘‘एकीनं माझा विश्वासघात केला. त्यानंतर मला आवडलेली मुलगी म्हणजे नंदनाच होती. पण तेव्हा काही लग्नाचा योग आला नाही. तिच्याकडून अजाणता चूक घडली आहे. पाप नाही. मी तिला तिच्या बाळासकट स्वीकारायला तयार आहे. तिला फक्त तिची इच्छा विचार.’’

‘‘विमलेश, मी तुम्हाला खात्री देते…आपला संसार खूप सुखाचा होईल. त्या संसारात फक्त प्रेम, विश्वास अन् समर्पण असेल…’’ खोलीतून बाहेर येत नंदनानं म्हटलं. विमलेशनं तिला जवळ घेतलं. ‘‘होय नंदना, आपलं पूर्वायुष्य विसरून आपण एकमेकांना साथ देऊ,’’ तो म्हणाला.

तनुजालाही अश्रू अनावर झाले. तिच्या अत्यंत प्रेमाची दोन माणसं एकमेकांच्या आधारानं उभी राहत होती. त्यांची आयुष्य आता बहरणार होती.

तिनं फोन करून रजतला सगळं सागितलं. रजतही मोठेपणानं भारावला. त्यानं बाबांना फोनवर नंदनाचं लग्न ठरलंय एवढंच सांगितलं. बाबा घरी आल्यावर त्यांनी विमलेशच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. नंदनाच्या गरोदरपणाविषयी कुणालाच काही सांगितलं नव्हतं. अजून पोट दिसत नसल्यानं कुणाला काहीच शंका आली नाही. नंदना विमलेशचं लग्न थाटात झालं.

निघताना नंदनानं तनुजालाही मिठी मारली. रडत रडत ती म्हणाली, ‘‘वहिनी, खूप उपकार आहेत तुझे…आणि विमलेशचे…मी जन्मभर लक्षात ठेवीन. तुझ्यासारखी चांगली वहिनी मीही होईन…मला आशीर्वाद दे…’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...