कथा * कुमुद भटनागर

‘‘गाडीचा स्पार्क प्लग तर धड लावता येईना अन् म्हणे यांना इंजिनियर व्हायचंय…’’ साहिलला लेकावर डाफरताना बघून रहिलला हसायला आलं.

‘‘यात हसण्यासारखं काय आहे?’’ आता साहिल अजून वैतागला.

‘‘काही नाही. सहजच एक जुनी आठवण आली. या वर्षी दिल्लीच्या ख्यातनाम स्वाइन सर्जन डॉ. गुलाम रसूलला पद्मविभूषण मिळालंय ना, तो लहानपणी आमच्या शेजारी रहायचा. एकदा त्यांचा स्वयंपाकी आला नव्हता. त्याच्या आईनं त्याला मासळी कापून दे म्हणून म्हटलं. त्याला काही ते जमणारं नव्हतं, थरथरत्या हातात मासळी घेऊन तो माझ्या घरी आला अन् ही कापून स्वच्छ करून दे म्हणून मला गळ घालू लागला. गयावया करत होता…आज इतका यशस्वी सर्जन झालाय.’’

‘‘एकदम इतका फरक कसा काय पडला?’’

‘‘कुणास ठाऊक…नंतर माझ्या अब्बूची तिथून बदली झाल्यामुळे आमचा त्या कुटुंबाशी संबंधंच उरला नाही. नंतर परत लखनौला आल्यावर भेट झाली, तेव्हा कळलं तो पी.एम.टी. ची तयारी करतोय. त्याचं इंग्रजी कायम कच्चं होतं. त्यामुळे आमची भेट होताच त्यानं माझी मदत मागितली.’’

‘‘अन् तू ती केलीस?’’

‘‘हो ना, लहानपणापासून मी त्याला मदत करतेय. इंग्रजीत मदत मिळाल्यावर त्याला पी.एम.टीमध्ये चांगले मार्क मिळाले अन् लखनौ मेडिकल कॉलेजात प्रवेशही मिळाला. तरीही इंग्रजीची त्याला धास्ती वाटायची. म्हणून रोज माझा अभ्यास सांभाळून मी त्याला इंग्रजी अन् इंग्रजीतून संभाषण करायला शिकवायचे.’’

तेवढ्यात फोनची घंटी वाजली अन् हे संभाषण तिथंच संपलं. आज त्याच संभाषणाचा धागा पकडून साहिल रहिलाला म्हणत होता की तिनं त्याच्या बॉसच्या कुटुंबाबरोबर दिल्लीला जावं अन् डॉ. रसूलच्या ओळखीच्या बळावर ताबडतोब अपॉइंटमेंट घेऊन बॉसचं ऑपरेशन करवून घ्यावं.

साहिलचे बॉस म्हणजे जनरल मॅनेजर राजेंद्र यांना फॅक्टरीत अपघात झाला होता. त्यांच्या मणक्यांना गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी लवकरात लवकर तज्ज्ञ सर्जनकडून ऑपरेशन व्हायला हवं असं सांगितलं होतं. थोडाही उशीर घातक ठरला असता. जन्मभराचं पंगुत्त्व आलं असतं.

याक्षणी सगळे पद्मविभूषण डॉ. गुलाम रसूल यांचंच नाव सुचवत होते. ते फक्त अत्यंत गुंतागुंतीचीच ऑपरेशन्स करायचे. ऑपरेशनला सात आठ तास लागतात. पेंशट शुद्धीवर आल्यावरच ते घरी जातात. थकवा उतरला की दुसरं ऑपरेशन सुरू होतं. त्यांची भेट मिळणं दुरापास्तच होतं.

‘‘इतक्या वर्षांनंतर आता पद्मविभूषण डॉ. गुलाम रसूलना रहिलाची आठवण तरी असेल का?’’

‘‘काहीतरीच काय बोलतेस रहिला? तुझ्या इतकी मदत करणारी बालपणीची मैत्रीण कुणी विसरू शकेल का?’’ साहिलनं म्हटलं.

‘‘मदत लक्षात ठेवली असती तर संबंध बिघडलेच कशाला असते?’’ अवचित रहिला बोलून गेली.

‘‘म्हणजे? काही भांडण तंडण झालं होतं का?’’ साहिलनं विचारलं.

नकारार्थी मान हलवत रहिला म्हणाली, ‘‘नाही, तसं नाही. नेहमीप्रमाणे अब्बूंची बदली झाली. आमच्या बरेलीच्या घराचा पत्ता रसूल कुटुंबानं मागितला नाही, आम्हीही दिला नाही. दिवस तर भराभर जातातच. आत्ता पेपरला त्याच्या पद्मविभूषणची बातमी वाचली, तेव्हा कळलं की तो दिल्लीला असतो.’’

‘‘आता कळलंच आहे तर त्याचा फायदा घेत राजेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाला नवं आयुष्य मिळवून दे रहिला, अजून त्यांचं वय किती लहान आहे. नोकरीत प्रमोशन ड्यू आहे. वेळेवर उपचार नाही मिळाले तर सगळंच संपेल गं! त्याची लहान लहान मुलं, त्याची बायको यांचा तरी विचार कर. तिच्याशी तर चांगली मैत्री आहे तुझी.’’

‘‘साहिल, प्रश्न मैत्रीचा नाही, माणुसकीचा आहे, अन् मला का कुणास ठाऊक असं वाटतंय की त्या माणसाकडून माणुसकीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. भेटणं तर दूरच, मला कदाचित तो फोनवर ओळखणारही नाही. त्यात वेळ घालवण्याऐवजी आपण इंटरनेटवर अजून पर्याय शोधूयात.’’

‘‘सगळे तेच करताहेत पण टक रेकॉर्ड डॉ. गुलाम रसूलचाच सर्वोत्तम आहे. प्लीज, एकदा तू त्यांना फोन करून तर बघ.’’ अत्यंत अजीजीनं साहिलनं म्हटलं.

‘‘पण त्यांचा नंबर कुठाय?’’

‘‘अगं, तू त्यांना ओळखतेस म्हटल्यावर राजेंद्र सरांची बायको सारिका मॅडमनं, डॉ. रसूलचा मोबाइल नंबर, लँडलाइन नंबर आणि पत्ता मागवून घेतलाय. तू लवकर फोन केला नाहीस तर सारिका मॅडम स्वत: येतील इथं, तुझ्या मदतीच्या अपेक्षेनं, ते आवडेल का तुला?’’

रहिला शहारली. बॉसची बायको असली तरी सारिका तिच्याशी कायम मैत्रिणीसारखी वागायची. केवळ सारिकासाठी रहिलानं आपला स्वाभिमान, अभिमान बाजूला ठेवत त्याचा नंबर लावला. डॉ. रसूलकडून जरी अपमान अवेहलना झाली असती तरी सहन करण्याच्या तयारीनं रहिलानं नंबर लावला. तो स्विच्ड ऑफ होता.

घरचा फोन तिथल्या घरगड्यानं उचलला.

‘‘डॉक्टरसाहेबांचा फोन ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्यावरच सुरू होईल. तुम्ही मोबाइलवरच प्रयत्न करत रहा. डॉक्टर घरी कधी येतील काहीच सांगता येत नाही.’’

‘‘तू सतत प्रयत्न करत रहा. काहीही करून राजेंद्रसरांच्या ऑपरेशनसाठी त्यांना राजी करून घे. प्रश्न माझ्या नोकरीचा नाहीए रहिला…ती मला कुठेही मिळेल. एका भल्या माणसाच्या आयुष्याचा अन् त्याहून अधिक माणुसकीचा आहे.’’ साहिल गंभीरपणे म्हणाला.

‘‘तुझी नोकरी तर राजेंद्र सरांच्या परिस्थितीनं अधिकच पक्की झली आहे. त्यांची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. खरा प्रश्न आपल्या नैतिकतेचा अन् प्रामाणिकपणाचा आहे. आपल्याला त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे ते करावंच लागेल. डॉ. रसूलला सतत फोन करत राहते.’’ रहिलानं म्हटलं.

‘‘कर प्रयत्न. तोवर मी हॉस्पिटलमध्ये सारिका मॅडमजवळ थांबतो.’’ गडबडीनं साहिल निघून गेला. रहिला जुन्या आठवणींमध्ये दंग झाली.

गुलाम रसूलवर तिचं लहानपणापासून प्रेम नव्हतं. पण कॉलेजात मुलामुलींची प्रेमप्रकरणं बघून ऐकून तिला उंच, सडपातळ रसूल आपल्या स्वप्नांचा राजकुमार वाटू लागला होता. एक दिवस त्यानं तिला विचारलं, ‘‘तुझ्या इंग्लिश लिटरेचरमध्ये माझ्यासारखा हॅन्डसम हिरो आहे का? कारण तुम्ही मुली पुस्तकातल्या हिरोवरच प्रेम करता,’’ असं म्हणून तिच्या अबोल प्रेमाला जणू त्यानं फुंकर घातली होती.

अभ्यासाच्या ओझ्याखाली त्यांच्या भेटीगाठी तशा कमी झाल्या होत्या. मग रसूलही होस्टेलला रहायला निघून गेला. घरी यायचा तेव्हा भेटायचा, पण भेटीही ओझरत्या असायच्या. रहिलाला एम.ए. झाल्याबरोबर कॉलेजात नोकरी मिळाली. गुलाम रसूलही डॉक्टर झाला.

रहिलाच्या अब्बूंनी रसूलच्या अब्बूंना विचारलं, ‘‘गुलाम अली, या दोघांचं लग्न करून देऊयात का?’’

ते आनंदाने बोलले, ‘‘शम्शुल हक, छान सुचवलंत. प्रोफेसर आणि डॉक्टरची जोडी छान आहे. सुखाचा संसार करतील. मी रसूल आणि त्याच्या अम्मीला सांगतो. उद्या चांगला दिवस आहे. मिठाई वाटून सगळ्यांना बातमी देऊयात.’’

मात्र दुसऱ्या दिवशी अब्बूंनी विचारलं, तेव्हा गुलाम अली जरा तुटकपणेच म्हणाले, ‘‘रसूल अजून लग्नाला तयार नाहीए. एमडी करायचं म्हणतोय.’’

‘‘तसंही इतक्यात लग्न कोण करतंय? रहिलाला एम फिल अन् पुढे पीएचडी करायचं आहे. दोघांचं एवढं शिक्षण आटोपल्यावरच लग्न होईल ना?’’

‘‘हो, पण त्याला प्रोफेसर मुलगी नकोय. त्याच्या व्यवसायातली, डॉक्टर मुलगीच हवीय त्याला. शाळाकॉलेजात शिकवणारी शिक्षिका नकोय.’’ गुलाम अलींनी सांगून टाकलं.

अब्बूंना अन् रहिलाही हा आपला अपमान वाटला. दोन्ही कुटुंबातला जिव्हाळा कमी झाला. खरं तर दुरावाच निर्माण झाला. संबंध अधिक बिघडण्याआधीच अब्बूंची बदली झाल्यानं त्या गावचा संपर्कच उरला नाही. रहिलासाठी अब्बूंनी इंजिनियर साहिलला पसंती दिली.

तेवढ्यात साहिल आणि सारिका धापा टाकत आले, ‘‘रहिला, डॉ. रसूलला फोन लाव. दिल्लीहून माझ्या भावाचा फोन आलाय, डॉ. रसूल ऑपरेशन थिएटरबाहेर आले.’’ सारिका म्हणाली.

रहिलानं स्पीकर ऑन करून नंबर लावला. पलीकडून अत्यंत थकलेल्या आवाजातलं हॅलो ऐकायला आलं. रहिलानं आवाज ओळखला.

‘‘हॅलो, नमस्कार, मी रहिला बोलतेय, रहिला शम्स.’’

‘‘बोल रहिला.’’ थकलेल्या आवाजात आता उत्साह जाणवला. ‘‘शम्स वगैरे सांगायची काय गरज आहे?’’

‘‘नाही, मला वाटलं एकदम रहिला म्हटल्यावर ओळखाल की नाही. मी फार महत्त्वाच्या कामासाठी फोन करतेय, एका व्यक्तिच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.’’ एका श्वासात संपूर्ण परिस्थिती तिने सांगून टाकली.

‘‘अगं, पण अशा पेशंटला भोपाळहून दिल्लीला कसं आणता येईल?’’

‘‘एयर अॅब्युलन्सनं, डॉक्टर,’’ साहिलनं सांगितलं.

‘‘कारण ऑन ड्यूटी अॅक्सिडेंट झालाय म्हणून कंपनीनं एयर एब्युलन्सची व्यवस्था केली आहे.’’

‘‘तर मग ताबडतोब निघा. एब्युलन्समध्ये जे डॉक्टर पेशंटबरोबर असतील, त्यांची माझी बोलणी करून द्या. मी इथं माझ्या स्टाफला सगळया सूचना देऊन ठेवतो. इथं पोहोचताच पेशंटला इमर्जन्सीत शिफ्ट करतील, स्पेशल आयसीयू रूमही देतील. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तुम्ही निश्चिंत मनानं पेशंटला घेऊन या.’’ एवढं बोलून डॉक्टरांनी फोन बंद केला.

साहिल आणि सारिका तर आनंदानं वेडेच झाले. पण रहिला मात्र पुन्हा एकदा आपला अपमान झाल्यासारखं वाटलं. तिच्याशी काहीही न बोलता रसूलनं फोन कट केला हे तिला फारच लागलं.

साहिलनं सारिकाला म्हटलं, ‘‘मॅडम, तुम्ही ताबडतोब दिल्लीला जाण्याची तयारी करा. मी तुम्हाला घरी सोडतो अन् मग हॉस्पिटलमध्ये जाऊन सरांबरोबर जाणाऱ्या डॉक्टरशी डॉक्टर रसूलची फोनवर गाठ घालून देतो. रहिला, तुलाही चारपाच दिवस दिल्लीला रहावं लागेल.’’

‘‘मी?…मी कशाला? दिल्लीला जाऊन मी काय करणार? डॉक्टर रसूलशी बोलणं महत्त्वाचं होतं, ते झालं.’’

‘‘अगं, अजून खूप गरज आहे तुझी अन् मुख्य म्हणजे मला तुझा आधार हवा आहे रहिला. दिल्लीला तुझं जाणं फार गरजेचं आहे.’’ रहिलाचे दोन्ही हात आपल्या हातात घेत साहिलनं म्हटलं.

मुकाट्यानं रहिलानं आपली बॅग भरायला घेतली.

थोड्याच वेळात साहिल परत आला. ‘‘रहिला, इथून बरोबर जाणाऱ्या डॉक्टरांशी डॉक्टर रसूलचं बोलणं झालं आहे. प्रवासात काय काय सावधगिरी बाळगायची हे त्यांनी नीट समजावून सांगितलं आहे. अन् तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझे पाहुणे आहात. नि:शंक मनानं या हे पण सांगितलं.’’ तो म्हणाला.

‘‘अरे व्वा! आता तर मी जाण्याची गरजच नाहीए,’’ रहिलानं म्हटलं.

‘‘अगं, गरज कशी नाहीए? सरांचं ऑपरेशन कितीतरी तास चालेल. त्या दरम्यान सारिका मॅडमना तुझाच आधार असणार आहे.’’

‘‘पण हॉस्पिटलमध्ये फक्त सारिकाच पेशंटपाशी थांबू शकेल. मी कुठं राहणार?’’

‘‘हॉस्पिटलच्या समोरच एक गेस्ट हाउस आहे. तिथं कंपनीनं दोन तीन खोल्या बुक केल्या आहेत. कंपनीची पीआरओ अनिता अन् फायनान्स डिपार्टमेंटचा जितेंद्रही तुमच्या बरोबर असेल. दोघांनाही तू छान ओळखतेस.’’

रहिलानं सुटकेचा नि:श्वास सोडला.

‘‘इतकी सगळी मंडळी अॅम्ब्युलन्समध्ये बसतील?’’

‘‘नाही, फक्त डॉक्टर, पेशंट अन् मॅडम. तुम्ही तिघं सायंकाळच्या फ्लाइटनं जाताहात.’’

रहिला हॉस्पिटलमध्ये पोहोचली, तेव्हा राजेंद्रना तिथं अॅडमिट करून झालं होतं. सारिकाचा भाऊ तिच्याबरोबर होता. दोघंही डॉ. रसूलबद्दल अत्यंत आदरानं अन् कौतुकानं बोलत होते. डॉक्टरांनी अत्यंत आत्मीयतेनं त्यांची चौकशी केली होती. पेशंट पूर्ण बरा होईल याची खात्री दिली होती. त्यांच्या राहण्या जेवण्याच्या व्यवस्थेबद्दलही बोलले होते.

‘‘माझ्याबद्दल चौकशी नाही ना केली?’’ धडधडत्या हृदयावर हात ठेवून आपल्या भावनांना आवर घालत रहिलानं विचारलं.

‘‘एवढा वेळच नव्हता ना त्यांच्याकडे.’’ भाबडेपणानं सलीलनं, सारिकाच्या भावानं म्हटलं.

रहिलाचं मन कडवट झालं, तिच असते रिकामटेकडी कधी अभ्यासात मदत करायला नाही तर कुणाची तरी शिफारस करायला. तिनं वरवर काही दाखवलं नाही पण मनात ठरवून टाकलं, सारिकाच्या सोबतीला तिचा भाऊ आहे, तेव्हा ती उद्याच ऑपरेशन झाल्यावर भोपाळला परत जाईल.

सकाळपासून सायंकाळपर्यंत रहिला सारिकाच्याबरोबर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभी होती. ओ.टीचं दार उघडलं अन् डॉ. रसूल बाहेर आला. दोघांची नजरानजर होताच त्याच्या डोळ्यात ओळखीची चमक दिसली. पुढच्याच क्षणी तो सारिकाकडे वळून बोलला. ‘‘मी ऑपरेशन अगदी उत्तम केलंय. आता तुम्ही त्यांची छान काळजी घ्या. लवकरच ते पूर्ववत होतील. सध्या ते रिकव्हरीत आहेत. त्यांना आयसीयूत शिफ्ट करण्याआधी क्षणभर तुम्ही पाहू शकता, आता तुम्हीही रिलॅक्स होऊन विश्रांती घ्या. पेशंटची सेवा करण्यासाठी तुम्ही ठणठणीत असणं गरजेचं आहे.’’

‘‘तुमचे किती अन् कसे आभार मानू डॉक्टर…’’

‘‘आभार माझे नाही,’’ रसूल पुढे बोलणार तेवढ्यात नर्सनं सारिकाला आत जायची खूण केली. रहिलाही पटकन् पाठोपाठ निघाली.

‘‘आत फक्त पेशंटची पत्नी जाऊ शकते, तू नाही.’’ रसूलनं तिला अडवलं, ‘‘तशी तू थांबली कुठं आहेस?’’

‘‘समोरच्या गेस्ट हाउसमध्ये.’’

‘‘मग आता तिकडेच जा. हॉस्पिटलमध्ये विनाकारण गर्दी नको,’’ एवढं बोलून रसूल भराभर चालत निघून गेला.

संताप संताप झाला रहिलाचा. चिडचिडून ती गेस्ट हाउसच्या रूममध्ये आली. किती अपमान सहन करायचा? आता पुरे झालं. ऑपरेशन तर झालेलंच आहे. जितेंद्रला सांगून उद्याच्या पहिल्या फ्लाइटचं बुकिंग करून घ्यायचं. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला.

‘‘मॅडम तुम्ही कुठं आहात?’’ जितेंद्रनं विचारलं.

‘‘ताबडतोब हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये या. सरांची परिस्थिती बघून सारिका मॅडम खूपच घाबरल्या आहेत. खूपच बेचैन आहेत.’’

‘‘अनिताला सांग, त्यांची समजूत घालेल…सलीलही असेलच ना तिथं? अन् जितेंद्र, तिथून सवड मिळाली की ताबडतोब इथं या, गेस्ट हाऊसवर.’’ तिनं फोन बंद केला.

थोड्याच वेळात प्रचंड घाबरलेल्या सारिकाला सांभाळत अनिता अन् त्यांचं सामान घेऊन जितेंद्र अन् सलील गेस्ट हाउसवर पोहोचले.

‘‘आम्ही मॅडमना इथंच घेऊन आलो…’’

‘‘हॉस्पिटलच्या नियमानुसार आयसीयूत पेशंटचे लोकच राहू शकतात.’’ रहिलानं अनिताला सांगितलं.

‘‘ताई फार अपसेट आहे. मी रात्री राहीन तिथं भावजींसोबत. भाओजींचा चेहरा सुजला आहे. निळा निळा झालाय…’’ सलील म्हणाला.

‘‘ते सगळं अगदी स्वाभाविकच आहे.’’ सारिकाला स्वत:जवळ बसवून घेत, तिच्या पाठीवरून हात फिरवत रहिलानं म्हटलं, ‘‘स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन होतं त्यामुळे त्यांना इतके तास पालथं झोपवावं लागलं. ते अनेस्थिशिया दिल्यामुळे बेशुद्ध होते. त्यामुळे रक्त प्रवाह नेहमीसारखा नव्हता. त्यामुळे चेहऱ्यावर सूज आणि निळेपणा आलाय. सूज हळूहळू उतरेल. अजिबात घाबरायचं नाही.’’ रहिलानं सारिकाचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन चोळले…आता ती थोडी सावरली होती.

‘‘रहिलाताई, हेच मी ताईला सांगतोय पण तिला माझं म्हणणं समजतच नव्हतं.’’ सलीलही बिचारा रडकुंडीला आला होता. ‘‘तुम्ही ताईला तुमच्याच जवळ ठेवा. तिच्या जेवणाचं अन् झोपेचं बघा, भाओजींजवळ मी राहतो.’’

‘‘पण मी तर उद्या परत जातेय.’’ जरा तुटकपणे रहिलानं म्हटलं.

‘‘हे…हे कसं शक्य आहे?’’ अनिता अन् जितेंद्र एकदमच बोलले. दोघंही बावचळले होते.

सारिका तर रडायलाच लागली. ‘‘मला इथंच टाकून तू कशी जाऊ शकतेस रहिला? अगं, राजेंद्र अजून आयसीयूत आहेत. शुद्धीवर आलेले नाहीत. डॉ. रसूल सांगतील, तेव्हाच त्यांना क्लीनचिट मिळेल. दोन दिवस सतत ऑपरेशन करून डॉ. रसूल खूपच दमले आहेत अन् दोन दिवस इकडे फिरकणारही नाहीएत म्हणे…अशात काही झालं तर मी काय करणार? रहिला, मला सोडून जाऊ नकोस…’’

हे सगळं कमी होतं म्हणून की काय साहिलचा फोन आला. कंपनीचे चेयरमन तिला धन्यवाद देत होते. ते म्हणाले, ‘‘मॅडम, अजून काही दिवस तुम्ही दिल्लीला थांबा.’’ साहिलही तिच्याशी थोडा बोलला. फोन बंद झाला. रहिलाला अगदी नको नको झालं होतं. रात्री तिनं सारिकाला बळेबळे जेवायला घातलं. झोपेची गोळी देऊन निजवलं. पण रहिलाला मात्र झोप येत नव्हती. या सगळ्यांना वाटतंय डॉ. रसूलशी रहिलाची मैत्री म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना तेवढ्यासाठी ती हवीय. पण तिच्या दृष्टीनं डॉ. रसूलशी मैत्री व ओळख म्हणजे एक शाप होता. उपलब्धी इतरांच्या दृष्टीनं होती.

रसूलनं तिचा मास्तरीण म्हणून केलेला उपहास तिच्या जिव्हारी लागला होता. त्या उपेक्षेमुळे ती इतकी दुखावली होती की अभ्यासातलं तिचं लक्षच उडालं. कसंबसं तिनं एमफिल पूर्ण केलं. पण पीएचडीला अॅडमिशन मिळेल असे मार्क नव्हते पडले. तिच्या अब्बूंनी तिच्यासाठी इंजिनियर साहिलचं स्थळ आणलं होतं. तिनं साहिलशी लग्न करून संसार थाटला. साहिल खरोखर प्रेमळ, काळजी घेणारा नवरा होता. ती त्याच्याबरोबर पूर्णपणे सुखात होती. तिच्या शैक्षणिक योग्यतेमुळे अन् शिकवण्याच्या अनुभवामुळे तसंच कौशल्यामुळे ती एमबीए अन् यूपीएससीचं कोचिंग देणाऱ्या संस्थांमध्ये, पी.जी.च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायची. छान चाललं होतं तिचं…एकच खंत होती की रसूलच्या नाकावर टिचून तिनं उत्तम अभ्यास करून एमफिल अन् पीएचडी करून घ्यायला हवं होतं. डॉ. रहिला कॉलेजची प्रिंसिपल म्हणून मिरवली असती.

रात्री किती तरी उशीरापर्यंत तमळत ती जागी होती. नंतर केव्हा तरी झोप लागली. सकाळी अर्थात्च खूप उशीरा जाग आली. सारिका खोलीत नव्हती. स्व:तचं सर्व आवरून ती खोलीबाहेर आली, तेव्हा अनिता तिची वाट बघतच होती.

‘‘सलीलचा फोन आला होता, सर शुद्धीवर आले आहेत, म्हणून सारिका मॅडम व जितेंद्र तिकडे गेलेत. तुम्ही ब्रेकफास्ट आटोपून घ्या. मग आपणही जाऊ.’ तिनं म्हटलं.

त्या दोघी पोहोचल्या, तेव्हा सलील आणि जितेंद्र हॉस्पितळच्या बाहेरच भेटले.

‘‘थोड्या वेळापूर्वी डॉ. रसूल आले होते. त्यांनी भाओजींना उभं करून काही पावलं चालवलं. ते म्हणाले सगळं काही उत्तम आहे. आता त्यांना आयसीयूमधून साध्या रूममध्ये शिफ्ट करताहेत. इथेही पेशंटसोबत एकच  कुणी राहू शकतो. आता ताई आहे तिथं. नंतर तिला लंच आणि विश्रांतीसाठी तुमच्याकडे पाठवून मी इथं थांबेन.’’ सलील इतका भारावला होता की सांगता सोय नाही. ‘‘इथला स्टाफ सांगत होता की प्रथमच सलग दोन दिवस डॉक्टरांनी ऑपरेशन केलंय अन् इतके थकलेले असतानाही पुन्हा पेशंटला बघायला तत्परतेनं आले. रहि ताई, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुमची शिफारस कामी येतेय.’’

‘‘मी काहीच केलेलं नाहीए सलील. फक्त पेशंटची अत्यंत सीरियस अवस्था सांगितली होती. अशा नाजूक अवस्थेत असलेल्या पेशंटला बरा करण्याचं आव्हान कोणताही कुशल सर्जन स्वीकारतोच! ती संधी असते त्यांच्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची.’’ रहिला म्हणाली.

‘‘मॅडम, इथं आपल्याला थांबता येणार नाही. अन् गेस्टहाउसमध्ये तुम्ही एकट्या काय करणार? दिल्लीचा फेरफटका करून येणार असलात तर गाडीची व्यवस्था करून देऊ का?’’ जितेंद्रने विचारलं.

‘‘नको, त्यापेक्षा असं करा, तू अन् अनिता, दोघं दिल्लीचेच आहात, तेव्हा वाटल्यास तुम्ही तुमच्या घरी भेटून या. मी गेस्टहाउसमध्येच विश्रांती घेते. सारिका मॅडमच्या लंच अन् विश्रांतीचंही बघते. सायंकाळपर्यंत तुम्ही दोघंही परत या.’’ घरी जायला मिळाल्यानं आनंदी झालेल्या त्या दोघांनी रहिलाचे मनापासून आभार मानले.

ती गेस्टहाउसमध्ये रूमवर परतली. तिला थोडा एकांत हवा होता. तेवढ्यात दारावर टक्टक् झाली. समोर रसूल उभा होता. वयपरत्वे अंगानं भरला होता. पण डोळ्यातली चमक अन् चंचलपणा तसाच होता.

‘‘क्षमा कर रहिला. माझ्या शहरात येऊनही तुला असं गेस्ट हाउसमध्ये रहावं लागतंय…पण इच्छा असूनही मी तुला माझ्याघरी चल, असं म्हणू शकत नाही…’’ रसूलनं एकदम बोलून टाकलं.

‘‘का बरं? तुझ्या बेगमला अनोळखी पाहुणे घरी आलेले आवडत नाही का?’’ इच्छा नसतानाही तिरकसपणे बोलून गेली ती.

रसूलनं एक दीर्घ श्वास घेतला. मग म्हणाला, ‘‘बेगम स्वत:च पाहुण्यांसारख्या घरात येतात, रहिला, ती उत्तम गायनॉकॉलिजिस्ट आहे. कितीही गुंतागुंतीचं बाळंतपण ती सहज करते अन् मुलं होऊ नये म्हणून करायची ऑपरेशन्स पण म्हणजे हिस्टरेक्टोमी ऑपरेशन्स करताना तिला सवड नसते. वेळी अवेळी कॉल्स असतात.’’

‘‘अन् मुलं? त्यांना कोण बघतं?’’

‘‘दोन मुलं आहेत. नैनीतालच्या होस्टेलवर ठेवलंय त्यांना. सुट्ट्यांमध्ये ती इथं न येता लखनौला आजी आजोबांकडेच जातात.’’ पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, ‘‘अत्यंत हुषार अन् कर्तव्यदक्ष गायनॅक आहे ती. कितीतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत तिनं. डॉ. जाहिदा सुलताना.’’

‘‘व्वा! फारच छान. मियां पद्मविभूषण स्पाइन सर्जन अन् बेगम आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या गायनॉकोलॉजिस्ट. तोडीस तोड आहात की, उत्तम जोडी!!’’

‘‘कसली जोडी रहिला. एकाच घरात राहतो आम्ही पण दोन दोन दिवस आमची भेट होत नाही….तुझे मियांजी काय करतात?’’

‘‘एका मल्टीनॅशनल कंपनीत डेप्यूटी जनरल मॅनेजर आहेत. कामात तर असतात. पण बायको मुलांसाठी वेळ काढतात. त्यांच्याकडे लक्ष देतात.’’

‘‘तू काय करतेस?’’

‘‘आयएएस, एमबीए करणाऱ्या मुलांना इंग्रजी शिकवते. पहिल्यापासून इंग्रजी उत्तम होतं माझं…मुलांचं बघते, घर सांभाळते. नवरा अन् मुलं खुष आहेत माझ्यावर.’’

‘‘एकूण तू सुखात आहेस तर!’’

‘‘होय. आयुष्य सुखाचं आहे आणि परिपूर्णही. तुझं कसं काय?’’

‘‘ठाऊक नाही रहिला. मला सांगता येत नाही. जाहिदाबद्दल काहीच तक्रार नाही. माझ्या बरोबरीनं ती व्यवसाय सांभाळते आहे. माझा साथीदार आहे पण फक्त व्यवसायापुरती. स्वत:चं म्हणून आयुष्य असतं हे तर आम्ही दोघं विसरलोच आहोत..’’ रसूलनं एक सुस्कारा सोडला. आता नेहमी वाटतं त्यावेळी अब्बूंनी डॉक्टर प्रोफेसरची जोडी जमवली होती, तर मी त्यांची टिंगल केली. तुलाही विनाकारण दुखवलं मी. तो सल रात्रंदिवस छळतोय मला. पण तू सुखात आहेस हे बघून खूप बरं वाटलं.

रहिला फक्त बघत होती त्याच्याकडे. तिच्या मनांत आलं, ‘रसूल, माझ्या मनांतला सल आता गेलाय पण तुझ्या मनांतलं सल बघून मी मुक्काम ठोकलाय याची गंमत वाटतेय. माझा सुखी संसार बघून तुला आनंद झाला असेलही पण तो सळ मात्र तुला होणाऱ्या पश्चात्तापाच्या रूपानं सतत तुला छळेल…सलंत राहील.’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...