कथा * सुमन बाजपेयी

‘‘पुरे गं तुझं…सत्यवचन अन् प्रामाणिकपणा हे अगदी पोकळ शब्द आहेत. प्रिंसिपल्स म्हणे…काय देतात ती प्रिन्सिपल्स ज्यांना आयुष्यात धाडस जमत नाही ना, तेच असे बुळबुळीत शब्द वापरून जगत राहतात. तत्त्व, खरेपणा, परिश्रम, घाम गाळणं हे सगळं करून तू तरी काय मोठं मिळवलंय आयुष्यात?’’ सुकांत जोरजोरात ओरडत होता. नीलाला त्या क्षणी आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहोत असं वाटत होतं. तिच्या आयुष्याची, तिच्या व्यक्तिमत्त्वाची, तिच्या जीवन मूल्यांची लक्तरं करून वेशीवर टांगण्यात सुकांतला असूरी आनंद मिळत होता. तिचं वागणं कसं चूक आहे हे सिद्ध करण्याचं काम त्याला फार आवडत होतं.

‘‘तू ज्या कमिटमेंटबद्दल बोलतेस ती कमिटमेंट म्हणजे नेमकं काय असतं? आजच्या काळात असे शब्द म्हणजे पोकळ बुडबुडे ठरतात. कोण चिकटून बसतंय आपल्या शब्दांना? अगं सख्खे, अगदी आपलेही वेळ येते, तेव्हा शब्द फिरवतात अन् तू आपली कमिटमेंटला धरून बसतेस.’’

‘‘म्हणजे तुला असं म्हणायचंय की फक्त खोटेपणानं वागणारी, भ्रष्टाचारी, लबाड माणसंच आयुष्यात यशस्वी होतात?’’ सुकांतच्या एवढ्या भडिमारानंतरही नीला माघार घ्यायला तयार नव्हती. बालपणापासून झालेले संस्कार सहजी का आयुष्यातून नाहीसे होतात? अन् त्याला काय हक्क होता तिच्या विचारसरणीला धुडकावून लावण्याचा? या माणसाशी गेली २५ वर्षं ती संसार करतेय. सगळं काही तिनं त्याला समर्पित केलंय अन् तो तिच्या प्रामाणिकपणाला, निष्ठेला, सत्यवचनी असण्यालाच दूषणं देतोय? तिनं आयुष्यात काहीच मिळवलं नाही असं ठामपणे म्हणतोय? अर्थात् सुकांतच्या कनव्हिंसिंग कॅपॅसिटीबद्दल अन् गोष्टी मॅन्युपुलेट करण्याच्या क्षमतेबद्दल कुणाचंच दुमत होणार नाही…तर मग त्या क्षणी नीलालाही आपण हरलो, फेल्युअर ठरलो असं वाटलं तर त्यात गैर काहीच नव्हतं.

‘‘तू हा पोकळ आदर्शवाद न जपता सरळ थोडी आडमार्गानं गेली असतीस, वरिष्ठांचं लांगुलचालन केलं असतं तर आज करिअरमध्ये कुठल्या कुठं पोहोचली असतीस. तूच विचार कर, आज तू कुठं आहेस अन् तुझे ज्यूनिअर कुठच्या कुठं पोहोचलेत ते. तुझ्या योग्यतेचं काय लोणचं घालायचं का? तुझी योग्यता कुणाला समजलीय?’’ सुकांतचा चेहरा अगदी बिभत्स दिसू लागला होता. आज जणू नीलाचा अपमान करण्याचंच त्यानं ठरवलं होतं. स्वत:चा हलकटपणा जेव्हा लपवायचा असतो, तेव्हा दुसऱ्याच्या योग्यतेचे, सन्मानाचे वाभाडे काढणं हा अगदी सोपा मार्ग असतो.

‘‘तर मग मी तुझ्याशी एकनिष्ठ राहिले, समर्पित राहिले, नातं प्रामाणिकपणे निभावलं तेही माझं चुकलंच म्हणायचं? मला अशी निष्ठा ठेवायला नको होती…’’ तिनं थोडं तिखटपणे म्हटलं.

‘‘मी नात्याबद्दल बोलत नाहीए. उगीच कुठली तरी गोष्ट कुठं तरी नेऊन ठेवू नकोस. मी तुझ्या करिअरबद्दल बोलतोय,’’ सुकांतनं म्हटलं.

‘‘का बरं? हा नियम तर प्रत्येक बाबतीत लागू व्हायला हवा. तू आपल्या मर्जीनं हवं तेव्हा, हवं तसे नियम बदलू शकत नाहीस अन् माझ्या करिअरबद्दल बोलायचं तर मी आपल्या कामात संतुष्ट आहे. माझ्या वागणुकीमुळे मला ऑफिसात आणि बाहेर इतर ठिकाणीही मान मिळतो. तू कधीच मला मानानं वागवलं नाहीस. कारण तुझ्यात ती समजूतच नाहीए. कुणाला चांगलं म्हणतोस तू? कुणाशी तरी पटतं का तुझं?’’ नीलाच्या मनातला इतकी वर्षं दाबून ठेवलेला संताप आता उफाळून आला होता. खरं तर तिला स्वत:लाच आज आश्चर्य वाटत होतं की इतकं स्पष्ट बोलण्याचं धाडस तिच्यात आलं कुठून?

‘‘उगाच मूर्खासारखं बोलू नकोस, माझा ताबा सुटला तर…’’ सुकांत आता गडबडला होता. इतक्या वर्षांत नीलानं असं काही त्याला ऐकवलं नव्हतं.

‘‘तुझा ताबा नेहमीच सुटतो…काय करशील? शिव्या देशील? मारशील? घराबाहेर काढशील? याशिवाय काय करू शकतोस तू? मला वाटतं आपण हा विषय इथंच संपवूयात.’’ नीला शांतपणे म्हणाली. तिला विषय वाढवायचा नव्हता. वाढवूनही निष्पन्न काहीच होणार नव्हतं. गेल्या पंचवीस वर्षांत सुकांत बदलला नव्हता, तो आता काय बदलणार होता? जो स्वत:च्या बायकोला मान अन् आदर देऊ शकत नव्हता त्याच्याशी वाद तरी कशाला घालायचा? नीलाला वाईटफक्त एकाच गोष्टीचं वाटायचं की तिच्या एकुलत्या एका मुलाला, नीरवला, ती वडिलांच्या इन्फुलएन्सपासून वाचवू शकली नव्हती. नीरव केवळ वडिलांचंच ऐकत होता. त्यांचंच म्हणणं त्याला योग्य वाटत होतं. लहानपणी तिनं जे संस्कार त्याला दिले होते, ते त्यानं कधीच गाठोडं बांधून गच्चीवर भिरकावले होते. त्यानंतर त्यांने कधी तिकडे ढुंकुनही बघितलं नव्हतं. ती त्याला खूप समजवायची. ‘‘नीरव, अरे, स्वत:च्या डोळ्यांनी जगाकडे बघ, बाबांचा चष्मा लावून बघू नकोस. पण तोही तिचा अपमान करायचा. तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. ती अपमानाचा घोट गिळून गप्प बसायची. शाळाकॉलेज संपून नोकरीला लागला तरीही बाबाच त्याचं दैवत होते. त्यांच्याच मार्गावरून तो चालत होता.

मुलगा चुकीच्या मार्गानं जातो आहे, हे कळत असूनही तिला काहीही करता येत नव्हतं. हे दु:ख तिला दिवसरात्र छळत होतं. नीरवच्या काळजीमुळेच ती सुकांतशी भांडली होती. पण सुकांतनं आपली चूक कबूल करून नीरवला चांगल्या मार्गाला लावण्याऐवजी नीलालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. ही गोष्ट खरी होती की लांगूलचालन, लांडीलबाडी, खोट्यानाट्या चहाड्या यापासून ती कायम दूर राहिली होती. त्यामुळे ऑफिसात अन् समाजात तिच्याविषयी आदरयुक्त दबदबा होता. पण बॉसच्या मागण्या पूर्ण करून भराभर प्रमोशन्स घेणाऱ्या तिच्या ज्यूनियर्ससारखं ती वागू शकली नव्हती. स्वत:ची जीवनमूल्य, स्वत:चे संस्कार याविषयी ती अतिशय दक्ष होती अन् त्याबद्दल तिला समाधान अन् अभिमानही होता.’’

कित्येकदा सुकांतची वागणूक बघून तिला भीती वाटायची. कधीतरी आपलं खरंच चुकतंय का अशी शंकाही यायची. पण निर्मळ मन, निर्मळ चारित्र्य यामुळे ती कधीच वेडंवाकडं वागू शकली नव्हती.

सुकांत तिला ऐकवायचा, ‘‘बघ तू, मला अन् नीरवला टोमणे देतेस ना? एक दिवस तो कुठल्या कुठं पोहोचेल…किती भराभर प्रोग्रेस करतो आहे. आजच्या काळाला योग्य असंच वागतोय तो. तुम्ही लोकांना धक्का दिला नाही तर ते तुम्हाला धक्का देऊन पुढे निघून जातील. गरज पडली तर दुसऱ्याची संधीही हिसकावून घेण्याची धमक हवी माणसात.’’

नीलाच्या मनात आलं, ‘‘तू, त्या निरागस मुलाला माझ्याविरूद्ध प्यादं म्हणून का वापरतो आहेस? भांडण माझ्यातुझ्यात, आपल्या विचारात आहे. त्याला कशाला मध्ये आणतोस?’’ पण ती बोलू शकली नाही. सुकांत तिच्याकडे बघून उपहासानं हसत होता.

त्या रात्री बराच उशीर झाला तरी नीरव घरी आला नव्हता. नीलाला काळजी वाटत होती. ती व्हरांड्यात फेऱ्या मारत त्याची वाट बघत होती. मोबाइलही लागत नव्हता. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. तो सुखरूप असेल ना? त्याला काही झालं नाही ना? ऑफिसात कुणी फोन उचलत नव्हतं. साडे अकरा वाजून गेलेले. सुकांत दारू पिऊन जेवण करून ढराढूर झोपला होता.

अचानक तिचा मोबाइल वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. थरथरत्या हातानं तिनं फोन घेतला.

‘‘नीरवच्या घरून बोलताय?’’

नीलानं घाबरून विचारलं, ‘‘काय झालंय त्याला? तो बरा आहे ना? कुठं आहे? तुम्ही कोण बोलताय?’’

‘‘तुही शांत व्हा…नीरव बरा आहे. फक्त तो पोलीसांच्या ताब्यात आहे…कैदेत आहे…अरेस्ट केलं त्याला. कंपनीत घोटाळा केल्याची तक्रार कंपनीच्या मालकांनी केलीय. म्हणून त्याला अटक झाली आहे.’’

तेवढ्यात फोन समरनं घेतला. समर नीरवचा पक्का मित्र होता. ‘‘काकू, मी नीरवसोबत आहे…तुम्ही फक्त काकांना पाठवा. त्याला जामिन मिळाली की सुटका होईल.’’

तिनं गाढ झोपलेल्या सुकांतला उठवलं. सगळी रात्र त्यांची तुरुंगात गेली. गजाआड उभ्या असलेल्या आपल्या मुलाला बघून नीलाचे डोळे भरून आले. आई म्हणून ती किती कमी पडली होती…सुकांत मात्र अगदी गप्प होतात. त्यानं तिला किंवा नीरवला काहीही म्हटलं नाही. तो मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होता. नीलानं तिच्या काही हितचिंतक परिचितांना फोन केले. शेवटी एकदाची जामिनावर सुटका द्ब्राली. नीरवच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत होता. लाजेनं तो अर्धमेला झाला होता. मनातल्या मनात तो स्वत:ला दूषणं देत होता. आईची क्षमा मागत होता. आईचीच शिकवण योग्य होती हे त्याला कळलं होतं.

घरी पोचेतो सायंकाळ झाली होती. आपल्याच विचारात गुंग होती तिघंही. संपूर्ण रात्र अन् सगळा दिवस धावपळीत गेला होता. प्रचंड दमणूक झाली होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. त्याक्षणी ती शांतताच फार गरजेची होती.

‘‘आई मला क्षमा कर,’’ म्हणंत नीरवनं तिला मिठी मारली. तो हमसून हमसून रडत होता. नीला त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती.

‘‘तू का क्षमा मागतो आहेस? सगळी चूक खरं तर माझीच आहे. मीच तुझ्यावर असे वाईट संस्कार केले. खोटेपणा, प्रमोशनसाठी नको त्या गोष्टी करणं मी तुला शिकवलं होतं. आज जे काही घडलं त्याला मीच जबाबदार आहे. नीला, मला क्षमा कर. मी तुझा अपराधी आहे. सतत मी तुझा उपहास केला, अपमान केला, सगळीच समीकरणं चुकत होती माझी. पण मला आज कळलं, जीवनमूल्य खरीच महत्त्वाची असतात. तिच माणसाला उत्तम आयुष्य जगायला मदत करतात. ती पोकळ नसतात, उलट आपल्याला ठाम राहायला मदत करतात. प्रामाणिकपणा, खरेपणा, श्रमप्रतिष्ठा या पुस्तकी गोष्टी नाहीत…तोच जीवनाचा आधार आहे…’’ सुकांत बोलत होता. नीलाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या.

तिनं नीरवचे अश्रू पुसले. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. आज तिच्यातली आई विजेती ठरली होती. तिच्यापासून दुरावलेला तिचा मुलगा तिला परत भेटला होता. आता तिच्या आयुष्याची सगळी समीकरणं बरोबर जुळून आली होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...