कथा * शालू गुप्ते

शॉपिंग करून बाहेर आले तेव्हा मी उकाड्यानं हैराण झाले होते. समोरच्या शॉपिंग मॉलच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी घ्यावी अन् काही तरी खावं असा विचार करून मोर्चा तिकडे वळवला. आज मुलांची शाळेची ट्रिप गेली होती अन् माझ्याकडे रिकामा वेळही होता.

पती शशांक सध्या त्यांच्या नव्या बिझनेसमुळे खूपच बिझी आहेत. त्यामुळे मुलं, घरातल्या जबाबदाऱ्या, सासूसासऱ्यांची काळजी घेणं यातच माझा सगळा वेळ संपतो. कित्येकदा वाटतं, स्वत:च्या मनाप्रमाणेही कधी तरी करावं पण जमत नाही. आज मात्र तशी संधी मिळाली होती.

मी ऑर्डर देऊन जरा रिलॅक्स होतेय तोवर फोन वाजला. फोनवर शशांक होते.

‘‘कुठं आहेस?’’ त्यांनी घाईनं विचारलं.

‘‘थोड्याच वेळात घरी पोहोचेन,’’ मी म्हटलं.

‘‘बरं, असं बघ, चार वाजता शिपायाला पाठवतोय, मी टेबलवर जी फाइल विसरून आलोय, ती त्याच्या हाती पाठव,’’ त्यांनी फोन कट केला.

शशांकचं ते कोरडं बोलणं खरं तर मला खटकलं. पण मी स्वत:ची समजूत घातली. ते नक्कीच खूप घाईत असतील. पण तरीही प्रेमाचे दोन शब्द बोलायला तर काहीच हरकत नव्हती.

एके काळी शशांक प्रेमवीराप्रमाणे सतत माझ्याभोवती असायचे. पण नव्या बिझनेसच्या कामाच्या व्यापात बिचारे अगदी कोरडे झाले आहेत. अजून किती दिवस असे जातील कुणास ठाऊक…मी विचार करत होते तेवढ्यात वेटर कॉफी अन् ग्रिल्ड सॅन्डविच टेबलवर ठेवून गेला. मी आपलं लक्ष आता त्यावर केंद्रित केलं.

कॉफीचे दोन घोट घेतेय तोवर ओळखीचं हसू कानावर आलं. वळून बघितलं तर चकित झाले. एका पोक्तशा गृहस्थाबरोबर मानवी बसली होती. आम्ही दोघी कॉलेजात सोबत शिकत होतो.

मानवीला बघून माझं मन एकदम उल्हसित झालं. कॉलेजचे ते फुलपाखरी दिवस पुन्हा आठवले.

खरंच कसले बिनधास्त दिवस होते. आम्ही मुली निर्धास्तपणे कॉलेजात वावरत असू. आमचा एक ग्रुप होता. आम्ही अभ्यासाला कायम महत्त्व दिलं. त्या बरोबरच कॉलेजातल्या इतर अॅक्टीव्हिटीजमध्येही सहभागी होत असू. पण मानवीला मात्र अभ्यासात अजिबात गती नव्हती. तिला फक्त गप्पा, कॅन्टीन, भटकणं, सिनेमा, शॉपिंग एवढंच आवडायचं.

कॉलेजमधले अभ्यासाचे महत्त्वाचे तासही ती सहजपणे बंक करून मुलांबरोबर सिनेमाला निघून जायची. मला ते पटत नसे. आईवडिल आपल्या शिक्षणावर एवढा पैसा खर्च करतात, तर आपण अभ्यास करायला हवा. मानवीला मात्र मुलांना आपल्या नादी लावून झुलवत ठेवायला आवडायचं. एकाच वेळी तिची दोन दोन प्रकरणं सुरू असायची. तिचा हा बिनधास्तपणा मला मानवणारा नव्हता. त्यामुळे मी तिच्यापासून थोडं अंतर ठेवूनच राहायचे.

कधीही तिच्या घरी गेलं तरी ती तोंडाला फेसपॅक लावलेल्या अवस्थेतच सामोरी यायची.

‘‘परीक्षा डोक्यावर आलीए अन् तुला बरे फेसपॅक लावावेसे वाटतात?’’ मी वैतागून म्हणायचे.

‘‘मॅडम, तुमच्यात माझ्यात हाच तर फरक आहे,’’ जोरात हसून म्हणायची,

‘‘विचारांचा मूलभूत फरक…म्हणजे तू अभ्यासासाठी कॉलेजात येतेस, मी मुलांना गटवायला कॉलेज जॉईन केलंय. माझं तर ठाम मत आहे, माया हवी तर, काया म्हणजे देहाची काळजी घ्यावीच लागेल.’’

तिचं हे तत्त्वज्ञान माझ्या मेंदूत शिरत नसे. ज्यावेळी मी अभ्यासासाठी लायब्ररीत बसायचे तेव्हा ती कुणा मुलाबरोबर कॅन्टीनमध्ये असायची.

कॉलेजचे दिवस भराभर संपत होते. आमचा अभ्यास चालू होता. मानवीची प्रेमप्रकरणं रंगत होती. वाहत्या नदीसारखी मानवी सुसाट निघाली होती. कुणीच तिला अडवू शकत नव्हतं. खूप श्रीमंत कुटुंबातली लाडावलेली लेक होती. तिचं वेगळं विश्व होतं. ती नेहमी श्रीमंत मुलांच्याच मागे असायची.

मानवीभोवती मुलामुलींचा चमचेगिरी करणाराही गोतावाळा असायचा. त्यांना फुकटात सिनेमा बघायला मिळायचा. हॉटेलात ट्रीट मिळायची. कधी आलीशान मोटार गाडीतून लिफ्ट मिळायची. ती सर्व तिला त्यावेळी खूप नावाजत असत. आपली प्रशंसा ऐकून मानवीला धन्य धन्य वाटायचं.

शेवटी कॉलेजचे दिवसही संपले अन् सगळ्याच मैत्रीणी इकडे तिकडे पांगल्या. तरीही मानवीची बातमी म्हणजे एखादं नवं प्रेमप्रकरण कधी तरी कानावर यायचंच.

मग तिचं लग्न झाल्याचं कळलं. आता तरी ती थोडं स्थिर आणि चांगलं आयुष्य जगेल असं मला वाटलं. इतकी वर्षं तिचं ते अस्थिर आयुष्य, नवी नवी प्रेमप्रकरणं हे सगळं सभ्य सुसंस्कृत कुटुंबातल्या आम्हा मुलींना विचित्रच वाटायचं.

सगळ्यांचीच लग्न झाली. सासरचं घर. तिथल्या चालीरिती समजून घेणं, माणसांची ओळख होणं, मुलंबाळं वगैरे सर्व रहाटगाडग्यातून फिरताना मी मानवीला साफ विसरले होते.

आज तिला बघून मला वाटलं तिच्यामुळे अजूनही काही जुन्या मैत्रीणींची खबरबात कळू शकते. मी तर इतकी घरगुती गृहिणी झाले होते की जुन्या मैत्रीणींपैकी कुणाचाही संपर्क उरला नव्हता. मानवीच्या मदतीनं मला माझ्या काही जुन्या मैत्रीणींचा ग्रुप पुन्हा तयार करता येईल.

तेवढ्यात मला तो माणूस उठून निघून जाताना दिसला. मानवीही उठून उभी राहिली. मी तिला हाक मारण्याआधीच ती सरळ माझ्याकडे आली, ‘‘अगं, सुमी, तू इथं कशी?’’ तिनं विचारलं.

मी जवळची खुर्ची तिच्याकडे सरकवत म्हटलं, ‘‘थोडी खरेदी करायची होती. ती झाली, आता कॉफी घेतेय.’’

‘‘बाप रे! केवढी लठ्ठ झाली आहेत तू?’’ ती हसत हसत म्हणाली, तेव्हा मलाही जरा ओशाळल्यासारखं झालं. कारण मानवी अजूनही तशीच सुंदर दिसत होती.

‘‘अगं, आता दोन मुलांची आई झालेय…फरक तर पडणारच ना? अन् तुझं कसं चाललंय?’’

‘‘अगं, माझं तर अजून आयुष्यच सेट नाही झालेलं…मुलंबाळं तर फार दूरचा पल्ला आहे.’’

‘‘अगं, तुझं तर लग्न झालं होतं…’’

‘‘छे छे, त्या लग्नाचं नावही काढू नकोस. ते लग्न नाही, एक भूंकप होता माझ्या आयुष्यातला.’’ मानवीनं म्हटलं.

‘‘म्हणजे? नेमकं काय घडलं? नीट सांग तरी.,’’ मी म्हटलं.

‘‘लग्नापूर्वी माझा नवरा विरेंद्र फार मोठमोठ्या बाता मारायचा. मला वाटलं चांगला पैसेवाला आहे म्हणून मी लग्नाला हो म्हटलं. मी आधीपासूनच स्वतंत्र निर्णय घेणारी, मनात येईल ते करणारी, बिनधास्त मुलगी होते, हे तुला ठाऊकच आहे. पण विरेंद्र माझ्यावर खूपच बंधनं घालू लागला. पैसे कमी खर्च कर, क्लबमध्ये जाऊ नकोस…आता क्लबमध्ये रमी खेळताना कधी तरी हरणं, कधी तरी जिंकणं असतंच ना? त्याला म्हणे बिझनेसमध्ये एकदम खूप लॉस आला होता. पण त्याचा माझ्या खर्चाशी काय संबंध? मला त्यानं ठराविक रक्कम द्यायलाच हवी ना? माझ्या पार्लरचाच खर्च महिन्याला २५ हजार असायचा. तोही सासूला खटकायचा,’’ बोलताना ती खूपच उत्तेजित झाली होती.

मी पाण्याचा ग्लास तिच्यापुढे केला. तिनं घटाघटा पाणी पिऊन ग्लास रिकामा केला.

पाणी प्यायलावर ती थोडी शांत झाली. पुन्हा आपली रामकहाणी ऐकवू लागली, ‘‘माझ्या खर्चावरून रोजच कटकट व्हायची. मला ते सहन होईना, शेवटी मी सरळ एका वकील मित्राची मदत घेतली अन् त्याच्यावर सरळ ५० लाख रूपयांचा हुंड्यासाठी छळ करतात म्हणून दावा ठोकला.

‘‘आता त्याला कळेल मानवी म्हणजे काय चीज आहे ते. मी कोर्टात केस करताना त्याच्यावर जी कलमं लावली आहेत ना की बिचारा वर्षांनुवर्षं कोर्टात खेटे घालत राहिल. कर म्हणावं आता खर्च कोर्टाचा,’’ बोलता बोलता मानवीच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं.

मानवीच्या स्वभावाचा हा पैलू मला अगदीच नवा होता. मी चकित झाले होते. पण ती मात्र मजेत होती. एखादी शौर्यकथा सांगावी तशी ती आपली कहाणी सांगत होती.

‘‘मानवी, क्लबला जाणं वाईट आहे मी म्हणत नाही, पण नवऱ्याची आर्थिक परिस्थिती जर तेवढीशी चांगली नसेल, तर बायकोनं ते समजून घ्यायला नको का?’’ मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला.

‘‘झालीस का तू ही सुरू? जो उठतो तो मलाच सगळं सांगायला बघतो. हे बघ, हे माझं आयुष्य आहे अन् ते कसं जगायचं हे मीच ठरवणार. त्यात कुणाची लुडबुड नकोय,’’ मानवी एकदम आक्रमक झाली, ‘‘खरं तर माझी आईच मला समजून घेऊ शकली नाही…इतरांचं काय म्हणायचं? मला एक सांग, इकडे एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतोय अन् इथं मी माझ्या अधिकारासाठी लढा देतेय तर माझेच पाय मागे ओढताहेत माझीच माणसं,’’ तावातावानं मानवी बोलत होती अन् मी मुकाट ऐकून घेत होते.

मला एवढंच कळलं होतं की मानवी चुकीचं वागतेय. ती तिच्या आईचंच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार? मी पटकन् तिच्यासाठी एक कप कॉफी मागवली.

कॉफी पिऊन जरा ताजीतवानी झाली ती अन् मग म्हणाली, ‘‘मघा माझ्यासोबत होता ना, त्याचं नाव निकुंज. तो एक अत्यंत प्रसिद्ध वकील आहे,’’ अन् मग डोळा मारून पुढे बोलली, अन् तो बावळा माझ्या एका शब्दावर लाखो रूपये उधळायला तयार आहे.’’

एकदा बोलण्याच्या ओघात त्याला समजलं की माझा नवरा पैशासाठी माझी अडवणूक करतोय तर पटक्न म्हणाला, ‘‘मानवी डियर, नवऱ्याची ही हुकूमशाही कशाला खपवून घेतेस? अगं, तू तर उधाण आलेली नदी आहेस, तुला कोण अडवू शकेल? तुझ्या नवऱ्याची तर तेवढी ऐपतच नाहीए…तो लागतो कोण?’’

‘‘खरं तर मला घटस्फोट हवा होता म्हणून मी या निकुंजला भेटले होते, पण माझं दु:ख ऐकून तो व्यथित झाला. स्वत:हून म्हणाला, ‘‘तुझ्या नवऱ्याला असा स्वस्तात सोडू नकोस. त्याला चांगला कायद्याच्या कचाट्यात अडकवतो. मग बघ, कसा वठणीवर येईल.’’

त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी नवऱ्यावर व सासू सासऱ्यांवर केस केलीए, ‘‘माझी सासू आता गयावया करतेय. पूर्वी तिला माझं पार्लर अन् रमी खेळणं खटकायचं. आता गरीब बापुडवाणी झाली आहे. मला फार मजा येतेय त्यांना छळायला.’’

मानवीचं बोलणं ऐकून मी खरोखर हतबुद्ध झाले. मला तिच्या न बघितलेल्या नवऱ्याची अन् सासूसासऱ्यांची दया आली. त्या निकुंजचा रागही आला.

‘‘बराय, मी निघते, मला उशीर झालाय…’’ मी म्हटलं. सामान घेऊन मी उठले.

‘‘चल, निघूयात, मला आता ब्यूटी पार्लरला जायचंय. रात्री निकुंजबरोबर डिनर ठरलाय,’’ पुन्हा मला डोळा मारत ती म्हणाली, ‘‘आज निकुंजनं फाइव्ह स्टार हॉटेलात रूम बुक केली आहे. तो मला इतकं मिळवून देतोय तर मीही त्याला काही द्यायला हवं ना? पण हो, मी तुझ्याकडे परवा येते. तुझ्या मुलांना भेटते. मी त्यांची मावशी आहे ना?’’ तिनं आपला मोबाइल काढला.

मी चक्क खोटं बोलले, ‘‘माझा मोबाइल हरवलाय. तो नंबरही आम्ही ब्लॉक केलाय. नवा फोन आला की भेटूयात,’’ मी घाई घाईनं तिथून बाहेर पडले.

छे गं बाई यापुढे कधीच मी मानवीला भेटणार नाहीए. अशी विकृत स्वार्थी अन् नीतिहीन माणसं काहीही करू शकतात. ती चार हात लांबच असलेली बरी…

समोरून आलेल्या पहिल्याच रिक्षाला हात करून मी आत बसले. मानवीपासून लवकरात लवकर मला दूर जायचं होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...