कथा * मीरा शिंदे

माझे पती आशिष, त्यांचा मित्र गगन अन् त्याची पत्नी गायत्री. आम्हा चौघांत असलेलं सामंजस्य, परस्परांवर असलेला विश्वास अन् आदर अन् एकमेकांवरची माया हे इतकं अद्भूत होतं की सर्वांना आमचा हेवा वाटायचा. आम्हाला दोन मुलं होती. एक मुलगा, एक मुलगी. गगन, गायत्रीला मात्र मूलबाळ नव्हतं.

बऱ्याच प्रयत्नांनी गायत्रीला दिवस गेले. आम्ही सर्वच आनंदात होतो. पण तिला झालेलं मूल जन्मत: अनेक विकृती घेऊन आलं होतं. अन् जन्मानंतर काही वेळातच ते मूल मरण पावलं. गायत्री हॉस्पिटलमध्ये आयसीयूत होती. आशिष ऑफिसच्या दौऱ्यावर होते. पूर्णपणे कोसळलेल्या गगनला मी सांभाळत होते अन् आमच्याही नकळत ती घटना घडून गेली. निसर्गाने आपलं काम बजावलं अन् संकर्षणचा जन्म झाला. मला दिवस गेल्याचं लक्षात येताच मी आशिषना म्हटलं, ‘‘आपल्या अनवधनामुळे जन्माला येणारं हे बाळ आपण गायत्री, गगनला देऊया का आपली दोन मुलं आहेतच!’’ आशिषना माझ्या कल्पनेचं कौतुक वाटलं. आई असून मी मैत्रीसाठी त्याग करते आहे असं त्यांना वाटलं. तर आपलं मूल मी गायत्रीला देते आहे यामुळे तीही भारावून गेली. खरं काय ते मी अन् गगन जाणत होतो…तेवढी एक घटना सोडली तर आमच्यात त्यानंतरही अगदी पूर्वीप्रमाणे निखळ निर्मळ मैत्रीचं नातं होतं

कधी तरी माझ्या मनात अपराधीपणाची भावना दाटून यायची. नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला दूर लोटल्याची भावना अन् आशीषसारख्या सज्जन पतीपासून घडलेली घटना लपवण्याची भावना. पण यातच सर्वांचं भलं होतं. गगन गायत्री संकर्षण मिळाल्यामुळे खूप समाधानी अन् आनंदात होते. सगळं कसं छान चाललेंल अन् एक अपघात घडला.

संकर्षण दहा वर्षांचा होता. गगन गायत्री अन् संकर्षण केरळच्या प्रवासाला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. गायत्री जागेवरच मरण पावली. गगनला खूप जखमा अन् फ्रॅक्चर्स होती. गंभीर परिस्थितीत होता तो अन् चमत्कारिकरित्या संकर्षण बचावला होता. त्याला एक ओरखडाही उमटला नव्हता.

संकर्षण आमच्याजवळच राहात होता. बरेच महिने हॉस्पिटलमध्ये काढल्यावर गगन बरा झाला पण त्याला एकदम विरक्ती आली. एक दिवस त्याने आम्हा दोघांना बोलावून घेतलं. त्याचा सॉलिसिटरही तिथे होता. गगन म्हणाला, ‘‘माझी सर्व संपत्ती, प्रॉपर्टी मी संकर्षणच्या नावे केली आहे. मी आता संन्यास घेतोय. यापुढे तुम्हीच संकर्षणचे आईबाप. माझा शोध घेऊ नका. काही प्रॉब्लेम आलाच तर हा माझा सॉलिसिटर तुम्हाला मदत करेल.’’

आमच्या समजवण्याला, विनवण्यांना दाद न देता रात्रीतून गगन कुठे निघून गेला ते आम्हाला पुढे कधीच कळलं नाही. गगन व गायत्री गेल्याचं आम्हाला दु:ख होतंच पण आता आपला मुलगा आपल्याजवळ राहील या भावनेने आशीष सुखावले होते. त्यालाही आता दहा वर्षं उलटली होती.

कुठून कसं संकर्षणला कळलं की गगन गायत्री त्याचे सख्खे आईवडील नव्हते. तो आमचाच मुलगा आहे तेव्हापासून तो आमच्याशी फटकून वागू लागला. चिडून बरेचदा म्हणालाही, ‘‘मी जर तुम्हाला नको होतो, तर मला जन्माला का घातलंत? तुमच्यासारखे क्रूर आईबाप मी बघितले नाहीत. खुशाल मला दुसऱ्याला देऊन टाकलंत?’’

आमच्या मोठ्या दोन्ही मुलांशीही संकर्षणचं जुळत नव्हतं. त्याचं सर्वच बाबतीत या दोघांपेक्षा वेगळं असायचंय. त्याचा चेहराही बराचसा गगनसारखा होता. बरेचदा आपल्या दोन्ही मुलांपेक्षा त्याचं वेगळं असणं आश्चर्य वाटायचं. ते बोलूनही दाखवायचे, ‘‘नवल आहे, याचं सगळंच गगनसारखं कसं?’’

मी म्हणायची, ‘‘जन्मल्याबरोबर त्यांच्याबरोबर, त्यांच्याच घरात वाढलाय. त्याचा परिणाम असतोच ना?’’

आशीषना आश्चर्य वाटे, पण त्यांना संशय आला नाही. मी किंवा गगनवर त्यांनी कधीच संशय घेतला नाही. त्यामुळेच मला फार फार अपराधी वाटायचं. अनेकदा वाटलं खरं काय ते त्यांना सांगावं. पण आशीष ते ऐकू शकतील? शक्यच नाही.

संकर्षण आशीषसारखाच बुद्धिमान होता अन् तेवढ्याने आशीषचं पितृत्त्व समाधान पावत होतं. पण संकर्षण मात्र आमच्यापासून तुटला होता. अलिप्त झाला होता. एकटा एकटा राहात होता.

त्यातच तो आजारी पडला. अस्थमाचे अटॅक त्याला वारंवार यायचे.

एव्हाना आम्ही कोचिनमध्ये सेटल झालो होतो. आम्ही कोचिनमध्ये उत्तम डॉक्टर शोधले. बाहेरच्याही अनेक डॉक्टरांना दाखवलं. त्याला बरं वाटत नव्हतं. आता तर त्याला कित्येक तास ऑक्सिजनवर ठेवावं लागायचं. आम्ही दोघंही नवरा बायको फार काळजीत होतो.

शेवटी दिल्लीहून आलेल्या एक्सपर्ट डॉक्टरांच्या टीमने असा निष्कर्ष काढला की ही अल्फा, एण्टिटाइप्सीन डिसीज आहे. हा आजार जेनेटिक असतो. खरं तर वयाच्या तिशीनंतरच तो होतो, पण दुर्दैवाने ऐन विशीतच त्याने गाठलं, अस्थमाशी त्याची लक्षणं जुळतात. वडिलांची डी.एन.ए. टेस्ट करून घेतल्यास योग्य उपचार करता येतील.

आशीषने संकर्षणसाठी पटकन् डीएनए टेस्ट करवून घेतली. पण त्यांचे डीएनए एकमेकांशी विसंगत निघाले. कारण तो आशीषचा मुलगा नव्हताच ना?

रिपोर्ट कळताक्षणीच आशीष माझ्याकडे न बघता, संकर्षणचा विचार न करता कार घेऊन घरी निघून गेले. संकर्षणच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा तिरस्कार ओसंडून वाहात होता.

‘‘आजपर्यंत मला वाटायचं मी ‘अनवाँटेड चाइल्ड’ आहे. तुम्हाला नको असताना झालो म्हणून मला एखाद्या निर्जीव वस्तूसारखं दुसऱ्याला देऊन टाकलंत, आज तर कळतंय की मी पापातून जन्माला आलेला दुर्देवी मुलगा आहे. तू इतकी नीच असशील असं नव्हतं वाटलं मला. काकांचा विश्वासघात केलास…किती प्रेम आहे तुझ्यावर त्यांचं.’’

त्याच्या त्या अशक्त देहात त्याचा तिरस्कार, त्याचा संताप मावत नव्हता. तो खूप खूप बोलत होता. मला त्याला सांगायचं होतं की मी किंवा गगन आपापल्या पार्टनरशी प्रामाणिक होतो. तेवढी एक घटना सोडली तर आम्ही कायम मित्रच होतो. पण हे संकर्षण काय किंवा आशीष काय…समजून घेणार का?

‘‘संकर्षण गगनचाच मुलगा ना?’’ आशीषने मी घरी आल्यावर विचारलं.

‘‘हो.’’

आशीषही संकर्षणप्रमाणेच संतापले. मला टाकून बोलले. त्यांचा रागही वाजवी होता. मी त्यांचा विश्वासघात केला होता यावर ते ठाम होते. माझं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. संकर्षणने सर्व औषधं फेकून दिली होती. जेवणही घेत नव्हता. त्याची तब्येत आणखी खालावली होती.

त्या वीकएण्डला माझी मोठी दोन्ही मुलं संकर्षणला भेटायला आली. एरवी फोनवरून आमचं संभाषण चालूच होतं. पण संकर्षणची तब्येत खालावली असल्याचं ऐकून त्यांनी प्रत्यक्ष येण्याचा निर्णय घेतला होता.

आल्यावर चहा झाला. दोघंही फ्रेश झाले अन् दोघांनी एकदमच विचारलं,

‘‘आईबाबा, काय झालंय? तुम्ही दोघं फारच टेन्स दिसताहात…?’’

आशीष उठून तिथून दुसरीकडे निघून गेले.

‘‘यांना काय झालं, आई?’’ अंजनने विचारलं.

‘‘काही नाही रे, संकर्षणच्या आजाराने आम्ही काळजीत आहोत.’’

‘‘आई, ही काळजी त्याच्या आजारपणाची नाही. काहीतरी वेगळं कारण आहे. अगं, आम्ही आता लहान नाही आहोत. बरंच काही कळतं, समजतं आम्हाला. खरं सांग ना? कदाचित काही मार्ग काढता येईल,’’ अमिताने माझ्या गळ्यात हात घालत म्हटलं.

मुलांच्या बोलण्यामुळे माझ्या मनात आशेचा अंधुक किरण चमकला. पण पुन्हा शंकेची पाल चुकचुकली. आशीष काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीएत तर मुलं काय समजून घेतील? तरीही मी सर्व काही त्यांना सांगितलंच.

आजची पिढी खरोखर आमच्यापेक्षाही अधिक सहजपणे अन् मोकळेपणाने परिस्थिती समजून घेते. परिस्थितीचं विश्लेषण करते अन् त्याप्रमाणे निर्णयही घेते.

काही वेळ दोघंही गंभीरपणे बसून होती. मग अमिता म्हणाली, ‘‘तरीच आम्हाला वाटायचं की संकर्षण आमच्यापेक्षा इतका कसा वेगळा आहे…आता सर्व लक्षात आलं…’’

‘‘अंजन म्हणाला, ‘‘काही हरकत नाही. सर्व परिस्थिती बघता तुला अन् गगनकाकांनाही दोष नाही देता येणार. पण आई, तरीही तुझी चूक एवढीच की इतके दिवस तू ही गोष्ट बाबांपासून लपवून ठेवलीस त्यामुळे त्यांना त्यांचा विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. कारण गगनकाका अन् तू त्यांच्या फारच विश्वासातले होता. त्याचवेळी ही गोष्ट तू बाबांना सांगायला हवी होतीस.’’

‘‘दादा, काही तरीच काय बोलतोस? आजही जी गोष्ट बाबा ऐकून घ्यायला, समजून घ्यायला तयार नाहीत, ती गोष्ट त्यांनी त्यावेळी सहजपणे स्वीकारली असती?’’ अमिता म्हणाली.

‘‘नक्कीच! आता त्यांना धक्का बसलाय. या गोष्टीचा की ही गोष्ट आईने इतकी वर्षं लपवून ठेवली!’’

‘‘नाही. अजिबात नाही, त्यावेळी आईने ही गोष्ट लपवली नसती तर आपलं अन् गगन काकांचंही कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. गायत्रीकाकी काय किंवा आपले बाबा काय, कुणीच ही गोष्ट इतक्या सहजपणे स्वीकारली नसती,’’ अमिता ठामपणे म्हणाली.

‘‘तू म्हणतेस ते खरं आहे. आई त्यावेळी योग् वागली. चल…आपण बाबांना समजावू…अन् संकर्षणशीही बोलू,’’ अंजन म्हणाला.

‘‘ममा, तू संकर्षणपाशी हॉस्पिटलमध्येच थांब, आम्ही थोड्या वेळात तिथे येतोच.’’

मी माझं आवरून घरून निघाले. मी घराबाहेर पडल्यावर अंजन बाबांकडे गेला. त्यांच्या पुढ्यात शांतपणे बसला अन् म्हणाला, ‘‘बाबा, आईने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे. आता मला तुम्ही असं सांगा की तुम्हाला मुळात राग कशाचा आला आहे. जे गगनकाका व आईमध्ये घडलं त्याचा की ही गोष्ट तुमच्यापासून लपवली, याचा?’’

‘‘दोन्ही गोष्टींचा.’’

‘‘तरीही, अधिक राग कशाचा?’’

‘‘लपवण्याचा…’’

‘‘त्यावेळी तिने ते सांगितलं असतं तर तुम्ही त्या दोघांना क्षमा केली असती?’’

‘‘नाही…’’

‘‘तर मग किती आयुष्य उद्ध्वस्त झाली असती याचा विचार केलाय? ही गोष्ट आज कळतेय तरी तुम्ही, आई अन् संकर्षण इतके त्रस्त आहात. मानसिक ताण सोसता आहात…तुम्हाला आई किंवा गगनकाकावर कधीच संशय नव्हता अन् ही गोष्टही तेवढीच खरी की एकमेकांच्या प्रेमात पडून, आकर्षणापोटी ते एकत्र आले नव्हते. ती घटना म्हणजे एक अघात होता, क्षणिक चूक म्हणा…तर त्यासाठी तुम्ही स्वत:ला अन् आईला इतकी शिक्षा कशी देऊ शकता?’’

लेकाचं मुद्देसूद बोलणं आशिष लक्षपूर्वक ऐकत होते, ‘‘तुझं म्हणणं खरंय. मेंदूला तुझं म्हणणं पटतंय, पण मन ऐकत नाही,’’ ते म्हणाले.

‘‘मनाला समजवा, पपा…आईलाही खूप त्रास होतोए.’’

हॉस्पिटलमध्ये मी संकर्षणजवळ बसून होते. तो माझ्याशी बोलत नव्हता. माझ्याकडे बघतही नव्हता. तेवढ्यात अंजन व अमिता येताना दिसली.

‘‘काय झालं?’’ मी अधीरपणे विचारलं.

‘‘थोडा धीर धर. हळूहळू सर्व नीट होईल,’’ अंजन म्हणाला.

अमिताने संकर्षणच्या जवळ बसत विचारलं, ‘‘कसा आहेस?’’

‘‘बराय,’’ तुटकपणे तो म्हणाला.

‘‘आई तू घरी जा. आम्ही आहोत संकर्षणपाशी,’’ अमिताने म्हटलं.

‘‘आणि आम्ही जेवणही त्याच्याबरोबर घेणार आहोत,’’ अंजनने सांगितलं.

मी निघाल्यावर दोन्ही मुलांनी संकर्षणबरोबर खूप मोकळेपणाने गप्पा मारल्या. त्याच्या जन्माची कथा त्याला नीट सांगितली. आधी मूल होत नसल्यामुळे अन् नंतर विकृत मूल जन्माला येऊन मरण पावल्यामुळे गगन व गायत्रीवर कोसळलेल्या दु:खातून केवळ संकर्षणमुळे ते बाहेर पडले, सावरले अन् आनंदाचं आयुष्य जगू शकले. केवळ संकर्षणमुळे गायत्रीला आईपणाचं सुख मिळालं ही गोष्ट कशी विसरता येईल? त्याच्या मनातला ‘अनवॉन्टेड’ हा शब्द त्याने काढून टाकायला हवा. तो आजही सर्वांचा लाडका आहेच. एरवी त्याच्या आजारपणाने सगळेच असे हवालदिल झाले असते का? इतका खर्च, इतकी जागरणं, इतकी काळजी फक्त प्रेमापोटी करता येते. एक ना दोन, हर तऱ्हेने त्या दोघांनी संकर्षणला समाजावलं. त्यामुळे तो पुष्कळच निवांत झाला. त्याचा धुमसणारा संताप अन् माझ्याविषयीचा तिरस्कार निवला.

मधल्या काळात डॉक्टरांनीही त्याच्या आजारावर बरंच संशोधन केलं होतं. त्याचा आजार जेनेटिक नसून एलर्जीचा एक प्रकार असल्याचं सिद्ध झालं. त्या अनुषंगाने उपचार सुरू झाले अन् शारीरिकदृष्ट्याही संकर्षण सुधारू लागला.

काही दिवसांतच आम्ही त्याला घरी घेऊन आलो. संपूर्ण वर्षं त्याच्या आजारपणात गेलं होतं. पण आता तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या अगदी निरोगी व फिट होता. आता त्याचं इंजिनीयरिंगचं शेवटचं वर्षं होतं. त्याच्या एकविसाव्या वाढदिवसाला आम्ही जंगी पार्टी दिली. आता आम्ही एक परिपूर्ण अशी हॅप्पी फॅमिली होतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...