मिश्किली * पारुल पारवे

‘‘प्रिया, कुठं आहेस तू? जरा चाखून बघ आणि सांग बरं, भाजी कशी झाली आहे?’’ सासूबाईंची अशी हाक ऐकली की माझी भीतिनं गाळण उडते. अगदी निर्मनुष्य रस्त्यावर एखाद्या जुनाट पडक्या हवेलीतून काही आवाज ऐकल्यावर एकट्या वाटसरूची कशी अवस्था होईल तशी माझी अवस्था होते. म्हणजे माझ्या सासूबाई चेटकिणीसारख्या भेसूर, विद्रूप वगैरे नाहीएत. त्या छान गोऱ्यापान, सुंदर, नीटनेटक्या, थोडक्यात म्हणजे सुनेला चॅलेंज देणाऱ्या मॉडर्न सासूबाई आहेत.

आता तुम्ही म्हणाल, मग एवढं घाबरण्याचं कारण काय? घाबरायला होतं त्यांच्या स्वयंपाकामुळे, होय स्वयंपाकामुळेच निसर्गानं त्यांना रूप, सौंदर्य भरभरून दिलं, पण स्वयंपाकाची कला अजिबातच दिली नाही. माहेरी सुंदर म्हणून खूप कौतुक झालं. स्वयंपाकघरात कधी पाय ठेवला नाही. स्वयंपाक कधी केलाच नाही. सासरी सौंदर्याचं कौतुक नव्हतं. झपकन स्वयंपाक करावा लागला. पण त्यांनी काय शिजवलं अन् घरातल्यांनी काय खाल्लं याचा कधी ताळमेळ बसला नाही.

घरातली पुरूष मंडळी उगीच वाद घालत बसली नाहीत. त्यांनी घरातल्या जेवणाचा अनादर करायचा नाही म्हणून पहिलं वाढलेलं जेमतेम संपवून हात धुण्याचा मार्ग निवडला…मग उदर भरण्यासाठी बाहेर हॉटेल्स, रेस्टॉरंट, टपऱ्या, धाबे असं खूप काही असतंच, पण घरात अजून एक सदस्य आहे ज्यांना सासूबाईंचं रूप काय, रांधणं काय, काहीच आवडलं नाही. या म्हणजे माझ्या दुसऱ्या सासूबाई. नाही नाही गैरसमज नको. माझे सासरे खूपच सज्जन आहेत. त्यांचं एकच लग्न झालंय. या दुसऱ्या सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या थोरल्या जाऊ. म्हणजे माझ्या सासूबाईच झाल्या ना! यांना माझ्या सासूचं पाककौशल्य अजिबात आवडत नाही. त्या म्हणतात, ‘‘कधी आपल्यासारख्या फक्क गोऱ्या भाज्या करते, म्हणजे तिखट, हळद, मसाले काहीच न वापरता भाज्या करते तर कधी सूड उगवल्यासारख्या काळ्या ठिक्कर…म्हणजे भाज्या जाळून ठेवते…एकूण स्वयंपाक बेचवच!’’

आता या घरातली सध्या तरी मी एकुलती एक सून. त्यातून नाव प्रिया. मला सगळ्यांची प्रिय बनून राहणं भाग आहे. सुरूवातीला मी दोघींनाही खुश ठेवण्यासाठी त्या म्हणतील तसं करायची. परिणाम असा झाला की एकीचं ऐकलं की दुसरीला वाटे मी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानांत गेलेय. एक माझा हात धरून तिच्याकडे ओढायची, दुसरी माझी पाय धरून तिच्याकडे ओढायची.

काही दिवस बेचव जेवण जेवल्यावर माझं वजन कमी झालं, कारण मला घराबाहेर पडायची सोय नव्हती. मग मी माझ्या सासूबाईंना अगदी प्रेमानं म्हटलं, ‘‘सासूबाई, आता मी आलेय ना, आता या वयात तुम्ही स्वयंपाक कशाला करता? मी करत जाईन दोन्ही वेळचा स्वयंपाक.’’हे ऐकताच त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला, ‘‘या वयात म्हणजे काय? माझं काय वय झालंय का? तुझ्यापेक्षा जास्त काम करू शकते मी. अन् हे माझं घर आहे.मला हवे तेवढे दिवस मी काम करेन.’’

त्यांना कसं समजावून सांगू की सगळ्या भाज्या मला विनवताहेत, बाई गं, तुझ्या सासूच्या तावडीतून आम्हाला सोडव. खरंतर घरातील सर्वांवरच अत्याचार सुरू होता, पण उगीच बोलून वाईटपणा कोण कशाला घेईल?

खरं तर तो बेचव स्वयंपाक बघूनच माझी भूक मरायची. तो स्वयंपाक पाण्याच्या घोटाबरोबर घशाखाली ढकलताना जीभ सहकार्य नाकारायची. नातं सासूसुनेचं. कसं सांगायचं त्यांना? पुन्हा मी नवी एकुलती एक सून…रोजच मला त्या विचारायच्या, ‘‘स्वयंपाक चांगला झालाय ना?’’ मी त्यांच्या नजरेला नजर न देता इकडेतिकडे बघत म्हणायची, ‘‘बरा झालाय की!’’

एवढ्यावर सगळं थांबलं असतं तर प्रश्नच नव्हता. नेमकं अशावेळी दुसऱ्या सासूबाई प्रगट व्हायच्या, ‘‘कालच्या भाज्यांचा रंग तर बघवत नव्हता बाई! भाजी उपवर कन्या म्हणून उभी असती तर लग्न झालंच नसतं. कुष्णी कुष्णी पसंत केली नसती. इतकी वर्ष लग्नाला झालीत, पण एक दिवस धड जेवायला मिळालं नाहीए.’’ (आता या मोठ्या होत्या तर त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा घ्यायला काय हरकत होती?)

त्यांनी एवढं म्हणताच धाकट्या सासूबाईंना एकदम जोर चढला. त्या माझ्याच साक्ष काढतात, ‘‘काय गं प्रिया, काय वाईट होता स्वंयपाक? यांना तर माझ्या प्रत्येक कामात दोष काढायला फारच आवडतं, लग्न होऊन आल्यापासून यांनी कधी प्रेमाचा शब्द उच्चारला नाहीए. कधी जिवाला विसावा नाही मिळाला.’’

दोघी सासवा माझ्या  खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकींवर फैरी झाडतात. मधल्यामध्ये माझी कुंचबणा होते. मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायचं होतं. मी सतत विचार करत होते. शेवटी एक आशेचा किरण दिसला. दुसऱ्याच दिवशी मी जाहीर केलं की आजपासून मी एक स्पेशल डाएट प्लॅन माझ्यापुरता तयार केलाय अन् तो मी अंमलातही आणणार आहे. मी काय खायचं, केव्हा खायचं, कसं खायचं हे सगळं मीच ठरवणार आहे तर रोजच्या स्वयंपाकात मला धरू नका. ही योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली. एकतर त्या बेचव स्वयंपाकातून सुटका झाली, दुसरं म्हणजे दोघी सासूबाईंच्या ओढाताणीतून मला मोकळीक मिळाली. पण पंधरा वीस दिवसातच मी त्या डाएट प्लॅनला कंटाळले. आता पुन्हा घरच्या त्या बेचव स्वयंपाकाला शरण जाण्याखेरीज पर्याय नव्हता. पुन्हा तेच, ये रे माझ्या मागल्या…

मी डाएट प्लॅन बंद केल्यावर तर सासूबाईंचा उत्साह अजूनच ओसंडू लागला. त्या काहीतरी शिजवून आणायच्या अन् ‘‘प्रिया बघ बरं, सांग चव कशी आहे?’’ असं म्हणून मला खायला द्यायच्या. मी एखादा कोपरा मला कुशीत घेईल का म्हणून बघायची. म्हणजे त्यांच्या नजरेला पडायला नको किंवा वाऱ्याचा जोराचा झोत तरी यावा अन् त्यानं मला दुर कुठं तरी उडवून न्यावं असं वाटायचं. पण त्यातलं काहीच प्रत्यक्षात येत नसे. एकदा एक मैत्रीण घरी आली होती. तिनं अमेरिकेतून चुइंगम आणलं होतं. एक मी

सहज म्हणून तोंडात टाकलं. नेमक्या त्याचवेळी सासूबाई कशाची तरी चव दाखवायला म्हणून आल्या. मी म्हटलं, ‘‘माझ्या तोंडात चुइंगम आहे.’’

त्या बिचाऱ्या हिरमुसल्या होऊन परत किचनमध्ये निघून गेल्या. मला एकदम कल्पना सुचली, आता त्या मला चव दाखवायला आल्या की मी म्हणायची ‘‘माझ्या तोंडात चुइंगम आहे.’’

काही दिवस असे गेले. पण सासूबाई माझ्यापेक्षा हुशार होत्या. आता त्या स्वयंपाकघरातूनच मला हाक मारायच्या, ‘‘प्रिया, जरा इकडे ये बरं.’’

मी तिथं गेले की पटकन् विचारायच्या, ‘‘तोंडात चुइंगम नाहीए ना?’’ मी कावरीबावरी व्हायची, त्या पटकन् काहीतरी मला खायला द्यायच्या. एकूण ‘चव बघणं’ या कामातून मला सुटका नव्हती.

एकदा सासूबाईंनी कुठं तरी वाचलं की मोहरीचं तेल हार्ट अॅटकपासून वाचवतं. त्यानं आरोग्य चांगलं राहतं. इतर तेलांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल फार अधिक प्रमाणात असतं. झालं! त्या दिवसापासून आमच्याकडे सरसोंचं म्हणजे मोहरीचं तेल स्वंयपाकात वापरलं जाऊ लागलं. इकडे थोरल्या सासूबाईंनी फर्मान काढलं, ‘‘मला मोहरीच्या तेलाची अॅलर्जी आहे. मी त्या तेलातला स्वयंपाक खाणार नाही. पुन्हा  मधल्यामध्ये माझी पंचाइत झाली. भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये समझोता कसा करावा मला सुधरत नव्हतं. मला खूपच टेंशन आलं. त्यावर उपाय सापडत नव्हता.’’

मला वाटलं लवकर या समस्येवर उपाय मिळाला नाही तर माझं बी.पी. तरी वाढेल, माझी शुगर तरी शूट होईल नाही तर मी डिप्रेशनमध्ये तरी जाईन. नवरोजीला काही म्हणण्यात अर्थच नव्हता. माझी समस्या त्यांना समजणारच नव्हती. रात्रभर मी विचार करत होते, तळमळत होते, अन् शेवटी मी एका निर्णयाप्रत पोहोचले होते.

सकाळी न्याहारीच्या वेळी मी माझ्या दोन्ही सासूबाईंना सांगितलं की माझ्या माहेरची एक नातलग स्त्री आहे. काही कारणानं त्यांची आर्थिक परिस्थिती घसरली आहे, त्यांना स्वयंपाकाचं काम मिळालं तर हवंय. आपण त्यांना कामावर ठेवून घेऊ. त्यांना आर्थिक मदत होईल अन् त्या स्वयंपाकघर पूर्णपणे सांभाळतील.

आधी तर दोघींनी एकजुटीनं विरोध केला. ‘‘कशाला उगीच! आहोत की आपण करायला, खर्च वाढेल ना? वगैरे वगैरे…’’ मग मी जरा कठोरपणे अन् अगदी ठामपणे

सांगितलं, ‘‘मग मी त्यांना दर महिन्याला काही पैसे तसेच देईन. त्यांना काम द्यायचं नसेल तर नका देऊ.’’

मग दोघींनी एकदमच सूर बदलला, ‘‘चल, येऊ देत त्यांना, गरजू आहेत, कष्ट करून पैसा मिळवू बघताहेत, आपण मदत नाही करायची तर कुणी करायची? वगैरे वगैरे.’’ मी मनांतल्यामनांत जाम खुश झाले, आता चांगल्या चवीचा स्वयंपाक होणार अन् पोटभर जेवता येणार, कारण मी एका चांगल्या स्वयंपाकिणीशी बोलणी करून ठेवली होती. आता जे काय करायचं ते ती बघून घेईल. दुसऱ्यादिवशी बरोबर अकरा वाजता दरवाज्याची घंटी वाजली. मी दार उघडलं. दारात ‘ती’ होती. माझ्या समस्येचं उत्तर…दोन सासवांच्या जात्यात मी उगीचच भरडून निघत होते. शेवटी उपाय सापडला. तिलाही आधीच घरातली परिस्थिती समजावून सांगितली होती. ती म्हणाली, ‘‘मी बघेन सगळं. घेईन सांभाळून, तुम्ही काळजी करू नका.’’

अन् मी निश्चंत झाले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...