* मिनी सिंह
भारतात सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर नागरिकत्वाच्या मुद्द्यावर चर्चा जोरात सुरू आहे. सीएएच्या माध्यमातून भारत शेजारील ३ देशांतील गैर-मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देईल, पण एक सत्य असेही आहे की, एकीकडे भारत शेजारील देशांतील लोकांना नागरिकत्व देणार आहे तर दुसरीकडे दरवर्षी लाखो भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून विदेशी नागरिकत्व स्वीकारत आहेत.
अलीकडेच, केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सांगितले की, २०२१ मध्ये सुमारे १.६३ लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. २०२० मध्ये सुमारे ८५ हजार २५६ लोकांनी आपले नागरिकत्व सोडले. २०१९ मध्ये १.४ लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ९.२४ लाख भारतीयांनी देश सोडला आणि ते विदेशी नागरिक झाले. २१ डिसेंबर २०२३ रोजी, ३०३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान, ज्यात बहुतांश भारतीय होते, ते सर्व मानवी तस्करीचे शिकार असल्याच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आले. हे विमान संयुक्त अरब अमिरातीहून मध्य अमेरिकन देश निकाराग्वाला जात होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या विमानातील ६६ प्रवासी गुजरातचे तर इतर पंजाबचे होते. या प्रवाशांमध्ये ११ अल्पवयीन मुलांचाही समावेश होता.
अवैध प्रवेश
यावरून असे दिसून येते की, पंजाब आणि गुजरातमधील गरीब खेड्यांतील हे प्रवासी बेकायदेशीरपणे अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्याच्या उद्देशाने निकाराग्वाला जात होते. ‘डंकी विमान’ भारतात परत पाठवल्यानंतर काही आठवड्यांनी, गुजरात पोलिसांनी निकाराग्वा सीमेवरून भारतीयांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत हलविणाऱ्या १४ दलालांवर गुन्हा दाखल केला. यातील बहुतांश दलाल गुजरातमधील होते तर काही दिल्ली, मुंबई आणि दुबईतील होते. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी या दलालांनी प्रवाशांकडून ६० ते ८० लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले. प्रवाशांनी ते खलिस्तानी आहेत, असे सांगावे आणि पोलिसांनी सीमेवर पकडलेच तर त्यांनी अमेरिकेचा आश्रय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी प्रवाशांना दिल्या होत्या.
त्या विमानातील सर्व गुजरातींना गुजरातला परतायचे नव्हते, असेही सूत्रांकडून समजले. येथून फक्त निकाराग्वाला जाणार यावर ते ठाम होते तर सुमारे १२ प्रवासी फ्रान्समध्ये आश्रय मागत होते.
आपल्या भारत देशाला एकेकाळी सोन्याचा पक्षी म्हटले जायचे. भारतातली कला, संस्कृती, शिक्षण, व्यवसाय, राज्यकारभार इ. जगभर आदराने स्वीकारले गेले. भारताच्या प्रगत अर्थव्यवस्थेची आणि समृद्धीची जगभर चर्चा झाली. जगाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येथे येत, पण आज लाखो भारतीय देश सोडून विदेशात जात आहेत, असे का?
आकडेवारी काय सांगते?
आकडेवारीनुसार, दरवर्षी लाखो भारतीय देश सोडून नोकरी, रोजगार, अमाप पैसा, चांगले जीवन इत्यादींच्या शोधात विदेशात जात आहेत. २०२० पासून अमेरिकेत भारतीयांच्या अघोषित स्थलांतरात आश्चर्यकारक वाढ झाली आहे. भारतातील आर्थिक संधींचा अभाव, अल्पसंख्याकांचा धार्मिक आणि राजकीय छळ आणि अमेरिकेत कायदेशीर स्थलांतर साखळीचा अभाव, ही कारणे यामागे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारत सोडून जाणाऱ्या लोकांची पहिली पसंती अमेरिका तर दुसरी कॅनडा आहे. याशिवाय लोक ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इटली, न्यूझिलंड, सिंगापूर, जर्मनी, नेदरलँड आणि स्वीडन इत्यादी देशांमध्ये स्थायिक होत आहेत. हा आकडा दरवर्षी वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीने देश सोडून विदेशात स्थायिक होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात, पण प्रश्न असा पडतो की एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय देश सोडून जाण्याचे मुख्य कारण काय असू शकते?
परदेशातील जीवन सोपं
मनीषा (नाव बदलले आहे) २००३ मध्ये नोकरीसाठी अमेरिकेत गेली आणि तिथेच स्थायिक झाली, तिचं म्हणणं आहे की, तिची मुलगीही तिथेच जन्मली, त्यानंतर तिने ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आणि तिथले नागरिकत्व मिळवले. इथलं जीवन खूप सोपं आहे. राहणीमान खूप छान आहे. मुलांचे शिक्षण चांगले होते. येथील संधीही भारतापेक्षा चांगल्या आहेत. याशिवाय कामाचे वातावरण खूप चांगले आहे. तुम्ही किती काम करता त्यानुसार मोबदला मिळतो. भारताला नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण किंवा ब्रेन ड्रेन (विदेशी स्थलांतर) नियंत्रित करायचे असेल तर अनेक पावले उचलावी लागतील. यामध्ये चांगल्या सुविधा, नवीन संधी, दुहेरी नागरिकत्वाचा विचार करणे गरजेचे आहे.
कॅनडामध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याने येथून आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता येथे काम करत आहे. तो आपले भारतीय नागरिकत्व सोडण्यास तयार आहे. येथे कामाचे चांगले वातावरण असल्याचे तो सांगतो. येथे तासांनुसार कामाचे नियोजन केले जाते आणि कामाच्या ठिकाणी नियम तसेच कायदे पाळले जातात. भारतात मात्र नियमांचे तितकेसे पालन केले जात नाही. त्यामुळे त्याला भारतात जायचे नाही.
जीव धोक्यात
२०१७ मध्ये सुमारे ३० भारतीय अमेरिकेसाठी डॅरियन गॅप (भौगोलिक क्षेत्र)मधून जात होते. थकवा, भूक, जंगली प्राणी, विषारी कीटक या आव्हानांची पर्वा न करता त्यांना कसं तरी अमेरिकेत जायचे होते. तहान लागली की ते शर्ट पिळून पावसाच्या पाण्यात भिजवत. खूप थकल्यासारखे वाटले की जंगलात कुठेतरी बसायचे किंवा झोपायचे. प्रचंड भूक लागल्यावर मनाला समजवायचे की, काही फरक पडत नाही, आता गंतव्यस्थान जवळ आले आहे, आपल्याला फार थोडे पुढे जायचे आहे.
ही कथा केवळ ३० लोकांची नाही तर विदेशात जाण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या शेकडो भारतीयांची आहे.
शाहरुख खानचा ‘डंकी रूट’ हा चित्रपट ज्यांनी इतरांना स्वीकारले त्यांच्यावर आधारित आहे.
परदेशात विशेषत: पाश्चात्य देशात (अमेरिका, कॅनडा, युके) जाण्याची इच्छा जवळपास प्रत्येक भारतीयाला असते. हे देश भारतीयांना आकर्षित करतात, तरुणांनी विदेशात जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्तम रोजगाराच्या संधी आणि अधिक कमाईची इच्छा. पण, या देशांचे नियम आणि कायदे अतिशय कडक आहेत आणि त्यामुळे मर्यादित संख्येनेच भारतीय तिथे कायदेशीर मार्गाने जाऊ शकतात. तरुणांना कायदेशीर मार्गाने परदेशात जाणे शक्य नसल्याने ते बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब करतात, ज्याला ‘डंकी रूट’फ्लाईट म्हणून ओळखले जाते. ‘डंकी रूट’ हा पंजाबी शब्द आहे ज्याचा अर्थ उडी मारून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे असा होतो. ‘डंकी रूट’वरून पाठवण्यासाठी दलाल लोकांकडून लाखो रुपये घेतात.
यूएस कस्टम्स अँड बॉर्डर पेट्रोलच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये, सुमारे ९,००० भारतीय मेक्सिकोमार्गे बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले. २०१७ च्या तुलनेत ही संख्या जवळपास तिप्पट अधिक होती.
अमेरिकेच्या आयबीआय कन्सल्टंट्स फर्मचे इमिग्रेशन तज्ज्ञ आणि संशोधन समन्वयक कॅटलिनयेल्स सांगतात की, लॅटिन अमेरिकेत जाणारे बहुतेक भारतीय ब्राझिलमार्गे मेक्सिकोला पोहोचतात, कारण येथील व्हिसा कायदे कमकुवत आहेत. येथून हे लोक महामार्गाने उत्तरेकडे सरकू लागतात आणि कोलंबिया तसेच मध्य अमेरिका मार्गे अमेरिकेच्या सीमेवर पोहोचतात.
येल्स सांगतात की, यातील बहुतेक स्थलांतरित आर्थिक संधींच्या शोधात किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह राहण्यासाठी येथे येतात. पंजाब आणि हरयाणासारख्या राज्यांतील अनेक स्थलांतरितांचे म्हणणे आहे की, ते धार्मिक छळापासून वाचण्यासाठी येथे येतात तर काही लोक राजकीय दडपशाहीबद्दल बोलतात.
प्रश्न असाही आहे
कॅलिफोर्नियातील फ्रेंसो येथील इमिग्रेशन वकील दीपक अहलुवालिया यांनी माध्यमांना सांगितले की, भारतातील राजकीय असंतुष्टता तसेच अल्पसंख्याक आणि समलिंगी समुदायातील लोक इतर देशांमध्ये आश्रय घेण्याचा सर्वाधिक प्रयत्न करतात.
इथे एक प्रश्न असाही पडतो की, पंजाब आणि हरयाणातील लोकांना अमेरिका आणि कॅनडात का जायचे आहे? याच्या उत्तरादाखल आपल्याला २०व्या शतकाकडे पाहावे लागेल. २०व्या शतकाच्या सुरूवातीस, पंजाबमधील जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील लोक अमेरिका, कॅनडा आणि यूकेमध्ये गेले. तेथे त्यांनी कठोर परिश्रम करून संपत्ती निर्माण केली. ते तिथून भारतात आणि त्यांच्या कुटुंबियांनाही पैसे पाठवत असत, त्यामुळे त्यांच्या गावाची आर्थिक स्थिती सुधारू लागली आणि हे सर्व पाहून तरुणांचे विदेशाकडे आकर्षण वाढले आणि मग कोणत्याही मार्गाने तिथे जाण्याची स्पर्धा लागली. तरुणांची मानसिकता समजून घेऊन कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याची चांगली संधी दलालांना मिळाली.
करोडपतीचे पलायन
दरवर्षी हजारो भारतीय करोडपती परदेशात जाऊन स्थायिक होतात. एचएनआयच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये सुमारे ६ ते ८ हजार उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्ती देश सोडण्याची अपेक्षा होती. कोरोना काळात अनेक मोठे उद्योगपती देश सोडून कॅनडा, अमेरिका, यूके, यांसारख्या देशांमध्ये स्थायिक झाले. धनदेवता कुबेराचा देश सोडण्यामागे कोरोना हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे अतिश्रीमंत भारतीयांसाठी गंतव्यस्थान बनत आहे.
भारतातील वाढत्या कर दरांमुळे असे होत आहे का? त्या देशांतील कराचे दर भारतापेक्षा कमी आहेत का?
जगभरातील सर्व देशांचे कर तपासले असता असे आढळून आले की, करांच्या दरात झालेली वाढ, हे भारतीय श्रीमंतांनी विदेशात स्थायिक होण्याचे कारण आहे. एका सर्वेक्षणानुसार, व्यावसायिकांचा असा विश्वास आहे की, त्यांना भारतातील त्यांच्या व्यवसायाच्या सुरक्षेची चिंता आहे. ही असुरक्षितता देशातील विविध कर आणि नियमांमध्ये दररोज होणाऱ्या बदलांमुळेही आहे. या असुरक्षिततेमुळे उद्योगपतींना देश सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. जर त्यांना भारतात त्यांच्या व्यवसायासाठी सुरक्षेची हमी मिळाली तर कदाचित स्थलांतर इतक्या मोठ्या प्रमाणात झाले नसते.
शैक्षणिक क्षेत्रात मागे पडत चाललेला देश
शैक्षणिक क्षेत्रात मुलभूत गरजांची कमतरता, हे देखील देशात घडत असलेल्या ‘ब्रेन ड्रेन’चे एक कारण आहे. सर्व प्रयत्न करूनही देशातील तरुणांना आरक्षण किंवा इतर कारणांमुळे कौशल्य विकसित करता येत नाही.
एकीकडे भारत इतर देशांशी स्पर्धा करण्याच्या शर्यतीत आहे तर दुसरीकडे येथील तरुणांना भारतापेक्षा इतर देशांमध्ये अधिक संधी दिसत आहेत. भारतातील बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे की, देश सोडून विदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. तरुणांमध्ये निराशा दिसून येत आहे आणि सरकारी धोरणे अपयशी ठरत आहेत.
भारतातील शिक्षण व्यवस्था हे स्थलांतराचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारताची शिक्षण व्यवस्था अजूनही त्या देशांइतकी चांगली नाही जिथे भारतीयांना जायला आवडते. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यापैकी सुमारे ७०-८० टक्के विद्यार्थी त्यांच्या देशात म्हणजेच भारतात परतत नाहीत. करिअरची शक्यता आणि चांगले भविष्य लक्षात घेऊन ते विदेशात स्थायिक होणेच अधिक पसंत करतात.
आपल्या देशातील नागरिक आनंदाने आपले नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व स्वीकारत आहेत, पण एक काळ असा होता जेव्हा जगभरातून लोक भारतात यायचे. ७व्या शतकात चीनमधून भारतात आलेला हेनसांग असो, ११व्या शतकात भारतात येणारा अल्बेरुनी असो किंवा इब्न बतूता १४व्या शतकात भारतात आला असो. आपल्या देशाचा वारसा असा आहे की, जगभरातून लोक येथे यायचे. भारतात राहाणारे लोक जसे श्रीमंत होतात तसे त्यांचे भारतावरील प्रेम कमी होत जाते आणि जेव्हा ते करोडपती आणि अब्जाधीश होतात तेव्हा ते भारत सोडून विदेशात स्थायिक होतात, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारत जागतिक स्तरावर अग्रेसर होण्याच्या मार्गावर असताना, भारतीय तरुणांचे इतर देशांत होणारे स्थलांतर हे चांगले लक्षण नाही.
गुजरात विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ गौरांग जैन सांगतात की, विदेशात जाण्याची शर्यत खूप तीव्र आहे. इथले लोक अमेरिकेत पोहोचण्यासाठी कितीही रोख रक्कम खर्च करायला तयार असतात. ते सांगतात की, एकदा त्यांनी त्यांचे ध्येय गाठले की, त्यांना तेथील समुदायाकडून प्रचंड पाठिंबा मिळतो.
एचडीपीच्या मते, कोविड १९ ने भारत सोडण्याच्या प्रवृत्तीला आणखी गती दिली आहे. श्रीमंत भारतीयांमध्ये ‘जीवन आणि संपत्तीचे जागतिकीकरण’ करण्याची प्रवृत्ती लक्षणीय वाढली आहे.
भारतीय वंशाचे रिअल इस्टेट मॅग्नेट आणि कॅनडातील मॅग्नेट तसेच मेनस्ट्रीट इक्विटी कुरीचे सीईओ बॉब विलो हे याकडे भारतातून स्थलांतराची तिसरी लाट म्हणून पाहातात. ते सांगतात की, सुमारे १०० वर्षांपूर्वी पंजाबमधील गरीब तसेच शेतकरी पाश्चिमात्य देशांकडे वळले होते त्यानंतर, भारतीय व्यावसायिकांमध्ये भारत सोडण्याची शर्यत होती आणि आता भारतातील श्रीमंत तसेच तरुणांमध्ये देश सोडण्याची चढाओढ आहे.
ओसीआय कार्ड म्हणजे काय?
भारतात दुहेरी नागरिकत्वाची सवलत नसल्यामुळे विदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांना त्यांचा भारतीय पासपोर्ट जमा करावा लागतो. विदेशी नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांसाठी ओसीआय कार्ड ही एक खास सुविधा आहे. ओसीआय म्हणजे ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ विदेशात स्थायिक भारतीय ओसीआय कार्ड घेऊन मायदेशी येऊ शकतात. त्यांना व्हिसाची गरज भासत नाही.
मात्र, या सर्व समस्यांवर उपाय एकच आहे की, भारतीय इतर देशांत स्थलांतरित का होत आहेत, यावर सरकारने तोडगा काढावा. आपल्या देशातील कलागुण बाहेर गेले तर आपल्या देशाचा विकास कसा होणार? त्यासाठी देशातील तरुणांना योग्य संधी आणि रोजगार, चांगली शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातील लोक बाहेर जाणार नाहीत.
चांगल्या आरोग्य सेवा देणे, नागरिकांना भयमुक्त वातावरण देणे आणि त्यांच्या चांगल्या जीवनासाठी तसेच उत्तम भविष्यासाठी जास्तीत जास्त सुविधा देणे, ही प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे. देशातील नागरिकांनीही आपले कर्तव्य विसरू नये, थोड्याशा स्वार्थासाठी आपल्या देशापासून दूर जाणे योग्य नाही. भारताला समृद्ध बनवायचे असेल तर सरकारसोबतच देशातील नागरिकांनाही विचार करावा लागेल की, आपण आपली प्रतिभा आणि पैसा इतर देशांसाठी न वापरता आपल्या देशाच्या प्रगतीसाठी वापरायला हवी.
अमेरिकेसारख्या मोठ्या देशात भारतीय आता सुरक्षित राहिलेले नाहीत. भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या नवीन वर्षात आतापर्यंत ५ भारतीय हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. ताजी घटना वॉशिंग्टन शहरातील आहे, जिथे एका संशयित अमेरिकन नागरिकाने भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला केला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.
जगभर लोकशाहीचा संदेश देणाऱ्या अमेरिकेचे वास्तव असे आहे की, भारतासारख्या देशातून जे लोक तेथे शिक्षण, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी गेले आणि तेथेच स्थायिक झाले, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास अमेरिका सक्षम नाही. वांशिक हिंसाचारावर नियंत्रण ठेवणे आजही त्यांच्यासाठी आव्हान आहे. अमेरिकन सरकारने या समस्येवर लवकरच तोडगा काढला नाही तर कुशल भारतीयांच्या योगदानापासून वंचित राहण्यासोबतच त्यांना फार मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल.





